मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अगतिक-भाग 4 ☆ सौ. सुनिता गद्रे

☆ जीवनरंग ☆ अगतिक-भाग 4 ☆ सौ. सुनिता गद्रे☆ 

‘दिवस’ झाले. नातेवाईक”सांभाळून रहा… काही मदत लागली तर आम्हाला ताबडतोब बोलवा. अर्ध्या रात्रीतनं पण आम्ही यायला तयार आहोत… वगैरे म्हणत आपल्या आपल्या परीने त्यांना धीर देत आपापल्या घरी परतले.

सगळं घरच जणू निष्प्राण झालं होतं. घरावर आलेली अवकळा अन् दुःखाची छटा काही कमी होत नव्हती. पुढच्या आठ दहा दिवसात इब्राहिम चाचा विजयला बरोबर घेऊन या-त्या ऑफिसच्या चकरा मारत होते. आवश्यक सर्टीफिकीटं, कागदपत्रं, दाखले हे सगळं  त्यांनी मिळवलं. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम सुरू झालं. पोलीस मुख्यालय, मानवाधिकार आयोग… महीला आयोग… विधवा सहायता कोष.. या सगळ्यांची ऑफिसं आणि ज्यांनी ज्यांनी मदतीचं आश्वासन दिलं होतं ती मोठी माणसं… सगळ्यांकडे हेलपाटे सुरू झाले. पण प्रत्यक्षात ताबडतोब योग्य ती मदत कुठूनच मिळत नव्हती.पोलिस खात्यातून आश्वासन दिलेले दोन लाख रुपये पण मिळत नव्हते. सगळीकडून गुळमुळीत उत्तरं, चार-पाच महिन्यानंतरचे वादे, संस्थेचे नियम… मिटिंग सध्या घेता येत नाही अशी अगतिकता. दोन महिन्याच्या काळात हेच सगळं पदरी पडलं होतं . सदानंदनं मंडईतल्या गाळ्या साठी भरलेला ऍडव्हान्सही परत मिळणार नव्हता. हेलपाटे घालून घालून दोघांचे पाय तुटायची वेळ आली.

सगळ्या गोष्टींचा त्यांना वीट आला. चाचा तर कामाची खोटी करून त्याला मदत करत होता. शेवटी एके दिवशी सकाळी सकाळीच तो त्यांच्या घरी आला.

“विजऽय” त्यांनं हाक मारली. सुशीला ची चाहूल लागताच तो म्हणाला,”भाभीजी, बुरा मत मानना… पण आता आपल्याला इतरांवर अवलंबून राहून चालणार नाही. एक महत्वाची बाबा तुम्हाला सांगतो… मनापासून… बघा पटतंय का! तशी मी आणखी कोशिश चालूच ठेवणार आहे. पण काय आहे, सोळा वर्षाच्या विजयला आता नोकरी नाही मिळणार .! बरं, मुलांच्या शाळा सकाळी असतात का दुपारी?

“दुपारी” विजय म्हणाला.

“ठीक आहे. सध्या तर सुट्टी चालू आहे. विजयला मोठ्या मंडईत घेऊन जातो. गाडीवर फळ घालून विकायचं काम तो करेल.”

“गाडी…. फळं…….”मायलेक हादरलेच.

“तुम्हाला धक्का बसेल…. मी समजू शकतो. पर क्या करे… आपल्याला जरा धाडस दाखवावंच  लागेल.”

                           क्रमशः … भाग- 5

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर. मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अगतिक-भाग 3 ☆ सौ. सुनिता गद्रे

☆ जीवनरंग ☆ अगतिक-भाग 3 ☆ सौ. सुनिता गद्रे☆ 

तो पर्यंत इब्राहीम पुढे झाला.

सांगू लागला, “या लोकांनीच सदा भैयाच्या मोबाईल वरनंआम्हा खूप जणांना फोन केले. मी पलीकडच्याच गल्लीत होतो… ताबडतोब पोहोचलो…. आम्ही सर्वांनी… तिथे दोन चार लोक होते त्यांनी मिळून सदाभैयाला सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. पण… पण तो…!”

इब्राहिमला पुढं बोलवेना.. थोडे हुंदके आवरुन तो पुढं म्हणाला, “पण हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्याचं स्टेटमेंट घेतलं आणि पाच मिनिटांनी होत्याचं नव्हतं झालं.

विजयला घडलेल्या प्रकाराचा थोडा थोडा उलगडा झाला. बायकांचा गलका ऐकून त्यानं इकडं तिकडं पाहिलं… आई चक्कर येऊन पडली होती… त्याला एकदम जबाबदारीची जाणीव झाली. आता आपणच पुढे होऊन सगळं करायला पाहिजे या विचाराने डोळे पुसून, सुन्न  मन आणि बधीर, जड झालेलं डोकं या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून तो उठला. त्याला सुचत गेलं. आईला सावरायला हवं… काका, मामा, आत्या कोणा कोणाला फोन पोहोचलेत, सगळी विचारपूस करायला हवी. ‘त्यानं पाहिलं…..

जशी आई सावध झाली तसे कॅमेरे आणि स्पीकर तिच्याकडे वळलेत बाबांचा देह, भावंडांचं रडणं, आईचं आक्रंदन सगळं टिपलं जाऊ लागलंय… त्यांच्या आयुष्यातली ही सर्वात दुःखद घटना त्यांचं घर सोडून इतरत्र सर्व टीव्ही चॅनेल वर आवेशा-आवेशात इतर बातम्या थांबून ब्रेकिंग न्यूजच्या रूपानं खणखणू लागली. मधूनच जे मीडिया कर्मी पोलीस चौकीत जाऊन पोहोचले होते ते तिथला वृत्तांत कव्हर करत होते. पोलिसांची हैवानियत, अत्याचार, गरिबांची पिळवणूक यावर भाष्य करता करता पोलीस इन्स्पेक्टर ला प्रश्न विचारून हैराण करत होते.

“त्या पोलिसाला अटक केलीये अन सस्पेंड केलंय. खात्यामार्फत चौकशीचे आदेश मिळालेत. अपराध्याला वाचवलं जाणार नाही. त्याला योग्य ती शिक्षा मिळेल.”ऑफिसर पाठ केल्यासारखी उत्तरं देत होते.

“सर, त्यांच्या गल्लीतल्या तरुणांना अटक केलीय?”

“हातात रॉकेल, डिझेलचे कॅन घेऊन पोलीस चौकी पेटवायला निघाले होते ते… पत्थरबाजी करून खिडक्यांच्या काचा फोडल्यात. दाखवा ते टीव्हीवर.”इन्स्पेक्टर आपली बाजू मांडत होता.

“ताबडतोब त्यांना ताब्यात घेऊन स्थिती नियंत्रणात आणलीय आम्ही…. आणि छोट्या चिल्यापिल्यांना  वॅनमधून पुन्हा गल्लीत सोडलंय.”मोठ्या फुशारकीनं ऑफिसर सांगत होता. “कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आम्ही खूप चांगल्या तऱ्हेने हाताळलाय.”

“पण सर, त्याची विधवा पत्नी, छोटी छोटी मुलं… त्यांचं काय पुढं?… त्यांचा काय अपराध?…. त्यांनी आता कसं जगायचं?”

“चौकशी पूर्ण झाली की सरकार योग्य तो निर्णय घेईल. दोन लाख रुपये मृताच्या संबंधितास देण्यात येतील. एका मुलाला नोकरी देण्यात येईल… नो मोअर क्वेश्चन्स!” त्यांच्या बोलण्यात सहानुभूतीचा लवलेशही नव्हता.

जमलेल्या मित्रमंडळींनी जड अंत:करणानं उत्तर क्रियेची तयारी सुरू केली. नातेवाईक पण पहाटेपर्यंत येऊन पोहोचले. विजयनं यंत्रवत् सारा अंत्यविधी पार पडला. घरी पोहोचताहेत तो त्यांच्या परिवाराला भेटायला येणाऱ्या लोकांची रीघ लागली होती… तोच दोन-तीन मोठ्या मोठ्या कार गल्लीत येऊन पोहोचल्या’ मानवाधिकार आयोगाचे’ लोक घरात आले. पुन्हा कालचे तेच तेच प्रश्न आणि तीच उत्तरे… पोलीस व्यवस्थेवर ताशेरे उडवून झाले… शाब्दिक सहानुभूती देऊन झाली .”आमच्या मीटिंगमध्ये प्रस्ताव मांडतो. तुमच्या कुटुंबाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही… सर्वतोपरी मदत करू… “आश्वासने देऊन धुरळा उडवत गाड्या निघून गेल्या. पाठोपाठच ‘महिला आयोग’ ‘विधवा पुनर्वसन मंडळ’ संस्थांच्या मोठमोठ्या कार्यकर्त्या महिला आल्या. “तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभ्या आहोत. त्या पोलिसाला शिक्षा दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. तुम्हाला आर्थिक मदत करू.”आश्वासनाचा पाऊस पडला अन् त्यांच्या गाड्याही दृष्टीआड झाल्या.

                           क्रमशः … भाग- 4

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर. मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अगतिक-भाग 2 ☆ सौ. सुनिता गद्रे

☆ जीवनरंग ☆ अगतिक-भाग 2☆ सौ. सुनिता गद्रे☆ 

संध्याकाळ झाली. मॅच खूप  रंगात आली होती. विजय ची बॅटिंग होती. अगदी ‘विराटच्या’ स्टाईल मध्ये  फटके मारत होता.

तेवढ्यात जोरात हाक ऐकू आली,”विज्याऽऽ,ए विज्या ,घरी चल.”समोर महेश दादा उभा होता.

“दादा जरा थांब ना, माझे एवढे बॅटिंग होऊ दे.” विजय मोठ्या अजीजीने म्हणाला.

पण रागाने आवेशात आलेल्या दादानं त्याच्या हातातली बॅट हिसकावून दूर फेकून दिली.

“काय झालं?…”काय झालं?” इतर मुलांनी एकच गलका केला.

एकाच्या हातातला बाॅल काढून घेऊन महेशनं खिशात टाकला.

“दादा ऽऽ असं काय रे!… आमची मॅच आणि सगळा खेळच तु विस्कटून टाकलास.” तक्रारीच्या सुरात विजय म्हणू लागला.

“चल घरी लवकर…”

त्याला डबल सीट घेऊन महेशनं सायकल जोरात पळवली. खेळ सोडून सगळेच त्यांच्या मागे धावत सुटले.

मेन रोड पासून ते घरापर्यंत विजयला खूपच गर्दी जाणवली. वातावरणात तणाव होता. एवढ्यात एक हॉस्पिटलची गाडी आणि एक पोलिस व्हॅन गल्ली बाहेर पडली.

“दादा, काय झालंय?” विचारताना विजय रडवेला झाला होता.

घरा समोरचे दृश्य पाहून तर तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

“पोस्टमार्टम करावं लागलं”.

“त्या पोलीस विरुद्ध एफ.आय. आर. केलीय’.”

“बिचारा सदानंद!” त्याच्या कानावर वाक्य आदळली.

गर्दीतून वाट काढत तो कसाबसा आत गेला अन्अंगणातलं दृश्य पाहून शक्ती पात झाल्यागत जमिनीवरच कोसळला.

पांढर्‍याशुभ्र वस्त्राने झाकलेला एक मृतदेह अंगणात मधोमध ठेवला होता. आई जोर-जोरात रडत आक्रोश करत जमिनीवर डोकं आपटून घेत होती. तीन-चार बायका तिला सावरत होत्या.

“बाऽऽबा” अजय ,संजय टाहो फोडून रडत होते. विजयनं बाबांच्या पायावर डोकं ठेवलं… अनावर दुःखाने तो ओक्साबोक्शी रडू लागला. याच जागी उभे राहून सकाळी सदानंदनं प्रेमानं त्याची पाठ थोपटली होती. तो बाबांच्या हाताचा स्पर्श त्याला अजून जाणवत होता. हे काय अन् कसं झालं? त्याला काहीच उमजत नव्हतं. इब्राहीम चाचानं त्याला बाजूला बोलवून कवेत घेतलं.

रडत रडत तो म्हणाला, “फारच वाईट झालंय बेटा…. पोलिसानं लाठीनं बेदम चोपलं…. वर्मी घाव बसला.अन्….

“पण का? विजयच्या मनात विचार येत होता अन् हुंदके थांबत नव्हते.

बाहेरची गर्दी पांगवण्यासाठी तीन-चार मोठ्या कारा ,बाइक्स तेथे येऊन थांबल्या. दहा-पंधरा लोक पटापट खाली उतरले. मराठी हिंदी इंग्रजी सगळ्या टीव्ही न्यूज चैनलचे पत्रकार आणि फोटोग्राफर आपल्या सगळ्या लवाजम्या निशी आत दाखल झाले. प्रश्‍नांच्या झडी बरसू लागल्या. कॅमेऱ्यांचे फ्लॅश लाईट चमकू लागले.

तोंडासमोर आलेल्या स्पीकर च्या गोळ्या समोर लोक उत्तर देऊ लागले. “व्हय मॅडम तिथच पोलीस चौकीपास्नं हाकेच्या अंतरावर… तिथं बिल्डिंग बांधतायत  नव्हं, तिथलं आमी मजूर. “आमच्या डोळ्यादेखत बिचाऱ्या या आंबे वाल्याला बडवायला सुरुवात केली की हो त्या मुर्दाड पोलिसवाल्यानं.”  “व्हय ह्यो बिचारा पोलिसाला म्हणत होता” साब पाचशे रुपये डझनाचं आंबं ते पण दोन डझन …फुकटात कसं दीऊ? निम्मं तरी पैसे द्या.”

“लई माजलास रं तू…. “असं म्हणत समदा आंब्याचा गाडा रस्त्यावर उधळूनशानी टाकला की  व्हं त्यानं. कोणी प्रत्यक्षदर्शी सांगत होता.

हयो बिचारा हात जोडून म्हणत हुता, “साब गरीब माणूस आहे. घरात लहान मुलं बाळं आहेत. गरीबाच्या पोटावर…”

“तर त्यो हवालदार पोटावर पाय नको काय मग पाठीवर मारतो म्हणाला.” “अन् वंगाळ शिव्या घालत या बिचार्‍याला लाठी आणि लाथेने मारायला लागला.”

“आम्ही समदं ह्येला वाचवायला धावलो तर दगडाच्या ढिगाऱ्यावर बेहोश होऊनशान पडला.”

आम्हीच चार-पाच गड्यांनी त्या- – -पोलिसांना घट्ट पकडलं आनि चौकीत घेऊन शान गेलो.

क्रमशः … भाग- 3

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर. मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अगतिक-भाग 1 ☆ सौ. सुनिता गद्रे

☆ जीवनरंग ☆ अगतिक-भाग 1☆ सौ. सुनिता गद्रे☆ 

रोजच्या जागी फळांची हात गाडी घेऊन विजयउभा होता. आज गाड्यावर ‘बिटका’ भरला होता. हापूस आंबाच, पण फळ बारीक म्हणून बिटका.

इब्राहिम चाचानं सल्ला दिला होता,”काय आहे ,या वर्षी बाजारात आंबा खूप आलाय. पण हापूस म्हणजे हापुस! त्याची टेस्ट दुसऱ्या कोणत्याही आंब्याला नाही. बिबट्या चा रेट कमी, त्यामुळे गरिबांना पण परवडतो. त्यामुळे विक्री चांगली होईल बघ.”

“खरंच,चाचा किती करतोय आमच्यासाठी.”विजय विचार करीत होता.

चाचा नेहमीच म्हणायचा,”सदा भैया चे फार एहसान आहेत माझ्यावर. अरे, गावातच राहिलो असतो तर चोऱ्यामाऱ्या,आवारागर्दी करत राहिलो असतो. जिंदगी बरबाद झाली असती. पण भैया मला इथं शहरात घेऊन आला. मला भाजी ची गाडी घेऊन दिली. भाजी कशी व्यवस्थित सांभाळायची, विकायची….. धंद्यातले पेच कसे सोडवायचे… या सगळ्या खाचाखोचा समजावल्या. त्यामुळेच आज मी इज्जतची रोटी खातोय. बायको, मुलं आणि मी त्याचे फार शुक्रगुजार आहोत बघ.”

हातगाडी घेऊन विजय उभा राहिला होता खरा, पण त्याचं आज लक्षच लागत नव्हतं. मनात येत होता मागच्या वर्षी चा हाच दिवस…‌ सगळ्यांचा आयुष्य बदलून टाकणारा…. परकेपणाचा दुःख मागे टाकायला लावून जबाबदारीची जाणीव करून देणारा. आजच बाबांचं श्राद्ध झालं. आठवणीनं डोळ्यात आसवांनी दाटी केली. अश्रू थांबायचं नावच घेत नव्हते. डोळे पुसत पुसत त्यानं  गाडी कडेला लावली…. आणि फुटपाथवर बसकणच मारली.

तो फळांचा गाडा आसवांच्या पडद्याआड नाहीसा झाला. त्याला दिसू लागला हातात बॅट घेतलेला विजय… आठवलं मागचं वर्ष… नुकतीच दहावीची परीक्षा आटोपल्यामुळे मित्रांबरोबरचं खेळणं, दंगा मस्ती! पण हा आनंद जास्त काळ नाही मिळाला.’त्या’ दिवशी सकाळी सकाळीच लवकर आंघोळ करून तो सज्ज झाला होता. एवढ्यात बाबांची हाक ऐकू आली. विजयनं दरवाजा उघडला. भल्या पहाटेच सदानंद फळ मंडईत गेला होता आणि तो आत्ता परतला होता.

“बघ कित्ती मोठं फळ आहे ते. अस्सल हापूसच्या पेट्या आहेत. देवगड हापूस!”

बॉक्सेस कडे बोट दाखवत… त्यातलं एक फळ काढून विजयला दाखवत, त्याच्या हातात देत सदानंद मोठ्या अभिमानाने म्हणत होता,”पुऱ्या मंडईत कुणी इतका महाग माल उचलायला तयार नव्हता. पण मी मोठे धाडस करून उचललाय…. हा सीझन चांगला गेला ना, तर आपला मंडईतील गाळा पक्का. मग असं गल्लोगल्ली गाडा घेऊन फळं नाही विकावी लागणार .”

सदानंद मनातल्या मनात तरंगत होता.

“मी येऊ मदतीला?” विजयनं  विचारलं.

“नको रे बाळा, अजून खाण्या खेळण्याचे दिवस आहेत तुझे. चांगली सुट्टी लागली आहे…. मजा कर.”त्याच्या पाठीवर थाप मारून सदानंद म्हणाला होता.

बापलेकाचा चहा पोळीचा नाश्ता सुरु झाला.

“पोट भरून खा रे… खेळाच्या नादात तुझं खाण्या जेवणाकडं लक्षच कुठं असतं!”आई-सुशीला त्याच्याकडं कौतुकानं पहात म्हणाली …. आणि अज्या,संज्या नाश्ता झाला की तुम्ही दोघं लागा अभ्यासाला. परीक्षा व्हायच्यातअजून तुमच्या.”ती गमतीनं दटावत धाकट्या दोघांना म्हणाली.

“करतात गंअभ्यास… ती पण हुशार आहेत.”सदानंद खुश होऊन बोलत होता.”या तिन्ही मुलांमुळे मला खूप हुरुप येतो. कसला क्लास नाही अन् कुठल्याही विषयाची शिकवणी नाही. त्यांना स्कॉलरशिप मिळतेय, बक्षिसं मिळताहेत, हीच मोठी समाधानाची बाब आहे. हवं तितकं शिकू देत. नंतर एखादा धंदा किंवा चांगली नोकरी!”सदानंद ला आज काय बोलू आणि काय नको असं झालं होतं.

“सदा भैया”जोरात हाक ऐकू आली.

इब्राहिम बाहेर उभा होता. त्याचं हे एक वैशिष्ट्य होतं की घराचा उंबरठा ओलांडून तो कधीही आत यायचा नाही. गाडीवर जरुरी पुरता माल भरून झाला तशी ती दोघं बाहेर पडली.

विजय पण सायकल घेऊन बाहेर पडला. आज दूरच्या टेकडीवरच्या मारुतीच्या मंदिरा पर्यंत सायकल रेस होणार होती. रेस झाली अन सपाटून भूक लागली. घरी आला,… जेवला… आणि लगेचच बॅट घेऊन बाहेर पडला.

“आई ऽऽ… संध्याकाळी मला उशीर होईल गं… आज आमची क्रिकेट मॅच आहे.”अंगणातूनच ओरडून त्यांनं सांगितलं.

बिचारे अजू, संजू मोठ्या असू येनं विजय कडे पहात अभ्यास करत होते.

क्रमशः … भाग- 2

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर. मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ससा आणि कासव — उत्तरार्ध ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆ ससा आणि कासव — उत्तरार्ध ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

मग त्याने अगदी लगेच आपला नवा दिनक्रम सुरू केला. पण जेमतेम एका महिन्यातच हे असं कशाला तरी बांधून घेण्याचा, ध्येय गाठण्यासाठी नेमाने प्रयत्न करण्याचा त्याला कंटाळा आला. आणि त्याने ठरवलं ….. ‘आता हे सगळं पुरे. झालोय मी आता पुरेसा सक्षम‘ ……आणि बाकी कसलाही विचार न करता तो बाहेर पडला.

‘आता शर्यतीसाठी एकच एक शिखर नाही, तर प्रत्येक प्राण्याबरोबर वेगळ्या वेगळ्या शिखरासाठी स्पर्धा लावायची ….. निश्चित ठरलं. मग त्याने पटापट प्राण्यांचा क्रम ठरवला. ….. आधी हरीण … ते काय… आधी जोरात पळेल, मग लगेच दमून थांबेल…. मग… जिराफ. .. स्वतःची इतकी उंच मान सांभाळत कितीसा लांब जाऊ शकणार आहे तो ?….. मग …हत्ती… त्याचं एक पाऊल म्हणजे माझी बारा- पंधरा पावलं…. तो कसला जिंकणार? … आता त्याचा आत्मविश्वास फारच वाढला होता…. आधी या तिघांना जिंकूया…मग वाघ- सिंह- चित्ता शंभरदा विचार करतील मी त्यांना स्पर्धा लावायची का असं विचारल्यावर….. या आत्मप्रौढीनेच तो इतका फुगला होता…पण त्याला मात्र आपण खूप सशक्त झाल्यासारखं वाटत होतं.

…… मग झाली एकदाची स्पर्धा सुरू … हरणाने त्याला बघता बघता सहज हरवलं….. जिराफ कधी पुढे गेला हे तर त्याला कळलंच नाही…. आणि मिजाशीने हत्तीकडे पहाता पहाता, त्याच्याच पायाखाली तुडवला जाण्यापासून तो थोडक्यात वाचला, आणि नाईलाजानेच थांबला. आणि तेव्हा त्याच्याकडे पाहून कुचेष्टेने हसणारे इतर कितीतरी ससे आणि काही प्राणी त्याला दिसले. त्याच्याही नकळत त्याचा माज उतरायला लागला होता. तिथून कसातरी पळ काढून, धापा टाकतच तो एका जलाशयापाशी पोचला. तहानेने, भुकेने तो अगदी व्याकूळ झाला होता, पण आता त्याला एक पाऊलही उचलवत नव्हते. अगदी म्लान झालेला तो तिथेच काठावर धपकन बसला. इतक्यात अचानक तो वृद्ध ससा तिथे आला. या सशाला पाहून त्याला खूप वाईट वाटले. आता याला सावरायला हवे या विचाराने तो त्याच्याजवळ गेला …… “बाळा दमलास ना पळून पळून? पण जिंकलास का?”

“नाही ना?”

“जाऊ दे. आता पाणी पिऊन घे. इथलं गवत खा. आणि डोकं शांत झालं की विचार कर. सतत नुसता पळत राहिलास. पण इतक्या दिवसात स्वतः साठी किती जगलास? या जलाशयाइतकं शांत, स्थिर मन कधी अनुभवलं आहेस का ? यातले मासे बघ, राजहंस बघ … कसे आनंदात आहेत. त्यांनाही असं जगण्यासाठी खूप धडपडावं लागतं, खूप धावपळ करावी लागते, पळापळ करावी लागते …. पण इतरांना हरवण्यासाठी ते कधीच काही करत नाहीत….

मान्य आहे हे जग आता स्पर्धेचे झाले आहे. पण ती स्पर्धा आता आधी स्वतःशीच करायला हवी. कालच्यापेक्षा आज मी कसा पळलो, आणखी पुढे जाण्यासाठी मी स्वतःच स्वतःत काय सुधारणा करायला पाहिजेत, काय बदलायला पाहिजे, काय सोडायला पाहिजे, याचा पूर्ण विचार कर. आयुष्यात कितीही ध्येये गाठायची असली तरी एकावेळी एकाच ध्येयाचा ध्यास घेणे श्रेयस्कर असते असं जाणती माणसं म्हणतात म्हणे. तेही नीट लक्षात ठेव……आणि मग निर्धास्तपणे उतर स्पर्धेत.

बघ मग एक दिवस तुझ्याही नकळत तू नक्की जिंकशील”……………………

………पुढे काही वर्षातच ससा खरंच जिंकतो आणि या गोष्टीची इतिश्री होते…….

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ससा आणि कासव (क्रमशः — पूर्वार्ध) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆ ससा आणि कासव (क्रमशः — पूर्वार्ध) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

लहानपणी आपल्यापैकी  बहुतेक सर्वांनीच ‘ ससा आणि कासव‘ ही गोष्ट ऐकलेली आहे. पण बहुतेक तेव्हा ती गोष्ट पूर्ण सांगितली जात नसावी, असं मला नेहमी वाटतं.

मग कशी असायला हवी होती ती पूर्ण गोष्ट?… अशी असेल का ? ……………….

अतिशय हळू चालणाऱ्या कासवाला आपण नक्कीच हरवू या मिजाशीत ससा मधेच झोपला, आणि ती शर्यत हरला. ……… अर्थातच त्याचा अहंकार दुखावला. आणि त्याने वेगळ्या मार्गावरून परत शर्यत लावण्याचे आव्हान कासवाला दिले. अर्थातच कासवाने लगेच ते स्वीकारले आणि स्पर्धा जास्तच त्वेषाने सुरू झाली.

त्या नव्या मार्गावर मधेच एक तलाव होता आणि सशाला ते माहितीच नव्हते. तिथपर्यंत तो अगदी सहज पोचला. पण मग पुढे जाण्यासाठी दुसरा रस्ता शोधणे भाग होते. त्याला एक रस्ता सापडला, जो त्याच्या अपेक्षेपेक्षा फारच लांबचा होता पण हे अंतरही आपण नक्कीच कासवाच्या आधी पार करू अशी त्याला खात्री होती. आणि तो धावायला लागला. नंतर कासवही त्याच्या गतीने त्या तलावापाशी पोचले. पण ‘ आता काय ‘ हा प्रश्न त्याला पडण्याचे कारणच नव्हते. ते तलावात उतरले… पोहत पोहत त्याने सहज दुसरा काठ गाठला आणि चिकाटीने उरलेलं अंतर कापत ते ठरल्याजागी जाऊन उभे राहिले. लांबचा वळसा घालून आलेला ससा धापा टाकत तिथे पोचताच, त्याच्या आधीच कासव तिथे पोचलेले पाहून जाम चडफडला. आणि‘ तू नक्कीच काहीतरी चीटींग केलं आहेस ‘ असं म्हणत तणतणत तिथून निघून गेला.

….. पण पुन्हा एकदा त्याच कासवाबरोबर हरल्याची बोच त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याने आता ठरवले की,  ‘कासवासारख्या चिल्लर प्राण्याशी स्पर्धा करण्यात आपण आपला मोलाचा वेळ वाया घालवला. आता आपल्यापेक्षा, किंवा निदान आपल्याइतक्या तरी चपळ असणाऱ्या प्राण्याशी स्पर्धा लावून ती जिंकून दाखवायला पाहिजे. ‘

असा प्राणी कोण याचा विचार करत भटकत असलेल्या त्याला, एक दिवस एक वृद्ध ससा भेटला. याने त्याला आपला निर्धार सांगितला. वृद्ध ससा किंचितसा हसला. या सशाच्या चेहेऱ्यावरचा ताठा, आणि स्वतःच्या कुवतीबद्दल – चा फाजील आत्मविश्वास त्याला स्पष्ट दिसत होता. पण आत्ता याला कुठलाही थेट सल्ला देण्यात काहीच अर्थ नाही हेही त्याच्या लक्षात आलं होतं. कारण स्वतःची नेमकी क्षमता किती, ठरवलेलं ध्येय योग्य आहे का, यासारखा विचारही याला कधी करावासा वाटलेला नाही, हे त्या अनुभवी सशाला प्रकर्षाने जाणवत होतं.

स्वतःची सर्व प्रकारची कुवत ओळखून, किती उंचावरचे ध्येय आपण गाठू शकू याचा त्रयस्थपणे विचार करून, ते ध्येय निश्चितपणे गाठण्याची क्षमता असणारे अगदी मोजकेच ससे असतात ,हे इतक्या वर्षात त्याने अगदी जवळून पाहिले होते. आणि बाकीच्या सशांची धाव मात्र….. आपणही स्पर्धेत उतरलो आहोत याचाच त्यांना मोठा अभिमान वाटत असतो.

… पण हा त्याचा प्रत्यक्ष अनुभव कितीही उपयुक्त असला, तरी हे सगळं या सशाला आत्ता पटणार नाही, हे त्याच्या आविर्भावावरून त्या वृद्ध सशाला खात्रीने कळलं होतं. मग तो त्या सशाला म्हणाला…..” हे बघ बाळा, तू मोठं स्वप्न पहायला काहीच हरकत नाही. पण एखाद्या दणकट प्राण्याबरोबर एका उंच शिखरावर पोचण्याची स्पर्धा लावण्याआधी तू स्वतःची ताकद, स्वतःची क्षमता सर्वतोपरी वाढवायला पाहिजेस. तू एक काम कर. मला वाटतं तुझ्या घराच्या जवळच एक गाजराचे शेत आहे. हो ना ? तो शेतकरी खूप चांगला आहे. त्याला नम्रपणे विनंती केलीस तर तो तुला रोज तीन – चार तरी ताजी गाजरे नक्कीच देईल. शिवाय तिथेच शेजारी मऊ गवताचे कुरणही आहे. तिथलं पिवळी फुलं येणारं गवत तुला खाता येईल. तिथेच पळण्याचा थोडा जास्तव्यायाम करता येईल. तुझी ताकद वाढली आहे असा विश्वास तुला वाटेपर्यंत हे सगळं करत रहा. आणि मग कुणाशी स्पर्धा लावायची ते ठरव.”…… जिंकण्याची अती घाई झालेल्या सशाला हे लगेच पटलं, आणि त्या वृद्ध सशाचे आभारही न मानता तो लगेच तिथून पळाला.

(क्रमशः)

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ काळजी ☆ सौ. अंजली गोखले

☆ जीवनरंग ☆  काळजी ☆ सौ. अंजली गोखले ☆

काकूंचा स्वयंपाक आवरला. हुश्श्य म्हणून पदराने चेहरा पुसत त्यांनी खुर्चीवर बसकण मारली. काम करून किती दमली आहे असं त्यांना काकांना दर्शवायचं होतं. पण काका पेपर वाचण्यात दंग होते. काकूंनी आपली कॉमेंट्री सुरू केली, ” छे !किती उकडतंय.  दमले बाई मी. या पोरांना मुळे वैताग आलाय. सगळे काम करायची आणि घरातच बसायचं. बाहेर जाणं नाही, शॉपिंग नाही, भिशी नाही, गप्पा नाहीत. कंटाळा आलाय नुसता. “एवढ्यात काकांच्या मोबाईल वाजला. नाइलाजानं का पुन्हा आपल्या बोलण्याला ब्रेक लावावा लागला.फोनवरचं बोलणं काका नुसतं ऐकत होते. थोड्याच वेळात त्यांनी मोबाईल स्विच ऑफ केला. “काय बाई तरी! बोलणं नाही,गप्पा नाहीत,.”काकू मनातच म्हणाल्या. कारण काकांच्या चेहऱ्यात काहीसा बदल झाल्यासारखा वाटला त्यांना. सिरीयस म्हणाना!

खुर्चीतून उठताच काका म्हणाले. “एवढी कंटाळी आहेस ना? वैतागली आहेस ना? चल जरा गाडीतून चक्कर मारून येऊ.”. काकू एकदम हरखून गेल्या. गाडीतूनच जायचे म्हणून साडी ठीक केली आणि पटकन तयार झाल्या. काका मात्र काहीच बोलत नव्हते. कोरोनामुळे गर्दी नव्हतीच रस्त्यावर. गाडी सुसाट गावाबाहेर आली. “अहो इकडे कुठे आलो? एवढा काळा धूर दिसतो आकाशात? अहो, हे को विड पेशंट चे स्मशान आहे ना?बापरे! पत्रे मारलेत वाटतं. हे लोक बिचारी झरोक्यातून डोकावतात. कशाला आलो  इकडं? “थोडं पुढे जाऊन काकांनी गाडी थांबवली. खिडकीतून बाहेर पहात काकू म्हणाल्या, “अहो ती मुलगी पाहिलेत का? बिचारी त्या डोळ्यांमधून डोकं पाहते हो. अहो ती शरद भाऊजींची मीरा आहे ना? हे कशाला इथे आली?” काकूंचा आवाज आता फारच काळजीचा झाला होता.

गाडी रस्त्याच्या कडेला पार्क करत काका म्हणाले, “बरोबर ओळखलस तू.ती शरीराची मिराच आहे. शरद कोरो ना मुळे गेला. निदान त्याचा चेहरा पाहायला मिळावा म्हणून मेरा आलीय इथे. बाहेर लोकांची काय अवस्था आहे, हेच दाखवायला तुला चल म्हटलं. नुसतं भिशी नाही, शॉपिंग नाहीम्हणून तुम्ही बायका त्रासून जाता.इतरांवर काय भयानक प्रसंग येतोय, किती यातना त्यांना सहन कराव्या लागतात ते बघ. तू गाडीतच थांब मी येतो पाच मिनिटात.”

काका गेल्यावर काकूंच्या छातीत अक्षरशः धडधडायला लागलं. ते भयाण भिषण दृश्य पाहणे क्लेशकारक होतं. अशी किती बळी कोरूना ने घेतले असतील? किती घरं उद्ध्वस्त झाली असतील? कसं सावरायचं यांनी? काकूंना काही सुचेना. आपण घरात राहतो ते किती सुखावह आणि प्रोटेक्टीव आहे. मीरा आणि तिच्या आईच्या आठवणीनेत्या कासावीस झाल्या. त्यांच्या काळजीने काकूंच्या मनाला घेरून टाकलं.

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ समर्पण (अनुवादीत कथा) – क्रमश: भाग 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ समर्पण  (अनुवादीत कथा) –  क्रमश: भाग 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

नर्स विचारात पडली होती. इकडे रोझाला आराम वाटू लागेपर्यंत तिकडे डिरांगची बेचैनी वाढत जायची. त्याची व्याकुळता पाहून रोझा हैराण व्हायची.  दोघांच्या वयात खूप अंतर होतं. एकाएकी तिला वाटलं ‘तशीही मी शहाऐंशी पार करणार आहे. कुणी मागे नाही, कुणी पुढे नाही. आणखी जगून तरी काय करणार आहे? पण या मुलापुढे तर सारा भविष्यकाळ आहे.’ शेजारून जाणार्‍या डॉक्टरांना ती म्हणाली, ‘सर, एक निवेदन आहे.’

‘मिस रोझा, आम्हाला आपल्या त्रासाची जाणीव आहे. जितकं शक्य आहे, तितकं आम्ही आपल्यासाठी करतोच आहोत.’ त्यांना वाटलं, तिला काही तक्रार करायची आहे.

‘जी, तेच म्हणते आहे मी! मला आता व्हेंटिलेटरची गरज नाही.’

‘म्हणजे?’ ते एकाएकी मागे वळले. चष्यातून बाहेर दिसणारे डोळे काहीच न समजल्याचा संकेत देत होते.

‘मी ठीक आहे. माझ्यापेक्षा डिरांगला व्हेंटिलेटरची जास्त गरज आहे.’

‘मिस रोझा काय बोलताय आपण?’

‘जी, माझी इच्छा आहे की मला व्हेंटिलेटर लावण्याच्याऐवजी आपण त्याला लावा. तशीही मी वयाच्या मानाने जास्तच जगले आहे.’

डॉक्टर रोझाचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होते.

त्यांना दुविध्यात पडलेलं बघून रोझा आपल्या अडखळत्या आवाजावर जोर देत म्हणाली, ‘मला एवढं कर्तव्य तरी पूर्ण करू दे. त्या नवयुवकाचे प्राण वाचवू देत.’

हतप्रभसे डॉक्टर डिरांगकडे पाहू लागले. त्यांना दोघांचीही चिंता वाटत होती. वय ,रंग, धर्म, जात असा कुठलाही भेदभाव न करता  जीवनाचं रक्षण करणं त्यांचं कर्तव्य होतं, पण रोझाने प्रेमाने, मानवतेच्या दृष्टीकोनातून धरलेला आग्रह स्वीकारण्यात त्यांना काहीच हरकत वाटणार नव्हती.

तरुणाची प्रकृती बिघडत चालली होती.

‘जरा घाई करा. त्याचा जीव वाचवा.’

ना कसला पेपर, ना कसली सही, ना नोकरीची चिंता. चिंता एकच होती. एक जीव वाचवण्याची.  कुठलाही उशीर न करता रोझाचा वेळही डिरांगला दिला गेला. एक असं काम तिने केलं होतं ज्याबद्दल ती स्टीव्हला सांगणार होती. अर्थात वर गेल्यावर…

तोदेखील खूश होऊन म्हणेल, ‘रोझ, तू खरोखरच रोझ आहेस. जीवनाचा सुगंध पसरवते आहेस.’

हे ऐकून रोझचे  गाल निश्चितपणे लाल होतील.

एक तास होऊन गेला होता. अर्ध जागृत, अर्ध निद्रावस्थेत ती स्टीव्हशी बोलत होती. डिरांगचे डोळे हळू हळू उघडू लागले होते आणि रोझाचे बंद होऊ लागले होते. तिच्या ओठांवर मात्र हसू होतं कारण समोर तिचा हात धरण्यासाठी स्टीव्ह उभा होता. जीवनाची देवाण-घेवाण झाली होती. मृत्यूने आमंत्रण स्वीकारलं होतं. वरचं छत धूसर होऊ लागलं होतं. क्षणभरात घेतलेला निर्णय समाधानाचा मृत्यू देऊन गेला होता.

आपला मृत्यू निवडण्याचं सुख सगळ्यांनाच मिळत नाही. रोझाला ते मिळालं होतं. लाकडाची हांडी स्वत:च चुलीवर चढली होती. कारण जाळ पेटलेला राहायला हवा होता.

 

मूळ लेखिका – सुश्री हंसा दीप

भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – गर्वहरण ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – गर्वहरण ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? बोध कथा?

कथा ५. गर्वहरण

धारानगरीच्या राजाच्या आश्रयाला दोघेजण रहात होते. त्यापैकी एक ब्राह्मण होता व दुसरा व्यापारी. तो राजा प्रेमाने दोघांनाही वेळोवेळी भरपूर धन देत असे. त्यामुळे ते दोघेही धनवान होऊन सुखाने जीवन जगत होते.

एक दिवस राजाने दोघांनाही विचारले, “कोणाच्या कृपेने तुम्ही सुखी जीवन जगत आहात?” “महाराज, आपल्याच कृपेमुळे मी सुखी जीवन जगतोय”असे ब्राह्मण उत्तरला. व्यापारी मात्र “देवाच्या कृपेमुळे मी सुखी जीवन जगतोय” असे म्हणाला. राजाने त्या दोघांच्याही बोलण्याची परीक्षा घ्यायचे ठरवले.

राजाने एका भोपळ्याला भोक पाडून त्यात मोती भरले. त्यानंतर ते भोक बुजवून तो भोपळा ब्राह्मणाला दिला. व्यापाऱ्याला दोन नाणी दिली. राजाने आपल्याला क्षुल्लक भोपळा दिला म्हणून ब्राह्मणाला खूप वाईट वाटले. भोपळ्यात मोती आहेत याची त्याला कल्पनाच नव्हती.

राजगृहातून बाहेर पडल्यावर ब्राह्मण व्यापाऱ्याला म्हणाला, “मला या भोपळ्याचा काहीही उपयोग नाही. जर तुला हवा असेल तर तू घे व तुझी नाणी मला दे.” “ठीक आहे” असे म्हणून व्यापाऱ्याने त्याला नाणी दिली व भोपळा घेऊन तो घरी आला.

जेव्हा व्यापाऱ्याने भोपळा फोडला, तेव्हा तो मोत्यांनी भरलेला पाहून त्याला खूपच आनंद झाला. तात्काळ राजाकडे येऊन त्याने सर्व वृत्तांत त्याला सांगितला. ती वार्ता ऐकताच ‘मी सर्वांचे रक्षण करतो’ या त्याच्या गर्वाचे हरण झाले व तो अधिक सुखाने राहू लागला.

तात्पर्य – परमेश्वराच्या सहाय्याविना मनुष्याचे प्रयत्न निष्फळ ठरतात.

 

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

कथासरिता उपक्रम साहित्य कट्टा,संयोजन- डॉ. नयना कासखेडीकर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ समर्पण (अनुवादीत कथा) – क्रमश: भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ समर्पण  (अनुवादीत कथा) –  क्रमश: भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

डॉक्टर, नर्सेस यांच्या सुरक्षिततेबरोबरच, घाबरलेल्या, निराश झालेल्या रुग्णांचा आक्रोश तत्परतेने हुशारीने थांबवणं हेही एक जरुरीचं काम होऊन बसलं होतं. जीव वाचवणार्‍या त्या देवदूतांनाही शिव्या दिल्या जात होत्या. एकीकडे मानव आपलं क्रूरतम रूप दाखवत होता, तर दुसरीकडे उदात्तता आणि मानवता यांची परीक्षा होती. प्रेतं उचलायलाही लोक मिळत नव्हते. जिवंत लोक उपचाराची प्रतीक्षा करत होते, तर हॉस्पिटलच्या प्रांगणात पडलेला प्रेतांचा ढीग आपल्या गंतव्याकडे जाण्याची प्रतीक्षा करत होता. पहिल्या दिवसाच्या प्रकोपानांतर व्हॅनमधून प्रेतं जात होती. आता व्हॅन छोट्या पडू लागल्या होत्या. मोठे कार्गो ट्रक बोलावले गेले. आता प्रेतं ट्रकपर्यन्त नेणं हेही मुश्किल होऊ लागलं होतं. हॉस्पिटलच्या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावरून  ट्रकमध्ये पोचणार्‍या प्रेतांना हॉस्पिटलच्या अनेक दरवाजातून बाहेर पडावं लागत होतं. यामुळे प्रेतं घेऊन जाणार्‍यांसाठी, रस्त्यात येणार्‍या रुग्णांसाठी, सगळ्यांसाठी धोका होता. आता उघडे कार्गो ट्रक अशा तर्‍हेने उभे केले गेले की प्लास्टिकमध्ये गुंडाळलेली प्रेतं वरच्या मजल्यांवरून थेट ट्रकमध्ये टाकता येतील. हा कुठल्याही प्रकारे मानवतेचा तिरस्कार नव्हता. हे म्हणजे जिवंत असलेल्या उरलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न होता.  जिवंत लोकांना सन्मान देण्याचा एक प्रकारचा प्रयत्न होता.

तास न तास इकडून तिकडे ढकललं गेल्यानंतर रोझाला कॅरिडॉरमध्ये ठेवलं गेलं. खोल्यांची कमतरता, बिछान्यांची कमतरता, मास्कची कमतरता, संसाधनांची कमतरता,  सगळ्यात जास्त म्हणजे व्हेंटिलेटर्सची कमतरता, अशा प्रकारे अनेक गोष्टींच्या कामातरतेमुळे प्रत्येक जण वैतागलेला होता. कामाच्या बोजामुळे, मृत्यूच्या भीतीमुळे आणि दु:खित मन:स्थितीमुळे सगळे त्रासलेले होते. सर्वसंपन्न माणसाची सारी ताकद या वायरसने खोटी पाडली होती. असं वाटत होतं, माणसाच्या विवशतेची टर उडवत कोरोंना व्हायरस खदाखदा हसतोय.

रोझाचा नंबर आला. पलंग आणि त्याचबरोबर कॅरिडॉरमध्ये जागा मिळाली, याचा अर्थ असा होता की आता उपचारांना लवकरच सुरुवात होईल. तिचा बेड आरामदायी होता. प्रत्येक बेडमध्ये आवश्यक तेवढं अंतर होतं. समोरची कॅरिडॉरची लाईनही पूर्ण भरलेली होती. रोझाच्या बरोबर समोर एक रुग्ण आपली वेळ येण्याची वाट पाहत होता. मधल्या रस्त्यातून जाणारे – येणारे डॉक्टर्स, नर्सेस जसा काही संकेत देत होते, की तिथे खूप काही चालू आहे.

या महामारीत कुणालाही आपल्या परिवारातील कुणालाही जवळ ठेवण्याची परवानगी नव्हती. रुग्णांनी घेरलेले स्वास्थ्यकर्मी जसे काही मृत्यूला आपल्या शरिरात घुसण्याचं निमंत्रण देत होते. अंतर ठेवून काम करायचं असलं, तरी जवळीक साधावी लागतच होती. ब्लड प्रेशर घेणं, रक्ताची तपासणी, व्हेंटिलेटर लावणं, ही सारी कामं स्पर्श केल्याशिवाय करणं शक्य नव्हतं. कुठे जाणार बिचारे? जीवन-भराच्या आपल्या कठोर परिश्रमाच्या बदल्यात त्यांना डॉक्टरचा सन्माननीय पेशा मिळाला होता. आज ते त्यापासून पळून जाऊ इच्छित होते. आपल्या निर्णयाबद्दल त्यांना पश्चात्तापही होत असेल कदाचित. त्यांच्या सगळ्या योग्यतेला, लायकीला नाकारत त्यांच्या पेशामुळे मृत्यू जसा त्यांच्या मागे लागला होता॰

रोझाच्या समोरच्या पलंगासमोर एक तरुण गंभीर परिस्थितीत होता. आत्तापर्यंत तिला वाटत होतं की साठ वर्षावरील लोकच या आजाराने त्रस्त आहेत.  हा तरुण तर पंचवीस – सव्वीस वर्षाचाच असेल. रोझाला पाहणारी नर्स त्याचीही देखभाल करत होती. त्याची परिस्थिती गंभीर होती. व्हेंटिलेटर रिकामे नव्हते. डॉक्टरांच्या कुजबुजीनंतर ठरवण्यात आलं की या दोघांना क्रमाक्रमाने व्हेंटिलेटरवर ठेवावं. गरजेप्रमाणे कधी रोझाला, कधी डिरांगला.

दिवसभर ती नर्स हेच करत राहिली. तिची ड्यूटी बदलल्यावर दुसरी नर्स आली. ती संगत होती, की डिरांगची परिस्थिती वाईट होत चाललीय. डॉक्टरांना बोलावलं गेलं दोघांच्या कुजबुजीतून स्पष्ट झालं की त्याला व्हेंटिलेटरची जास्त वेळ गरज आहे, नाही तर तो वाचू शकणार नाही. वस्तुस्थिती अशी होती की वारंवार व्हेंटिलेटर बदलल्याने कुणालाच फायदा होत नव्हता. रोझा आणि डिरांग व्हेंटिलेटर लावला की ठीक होत आणि काढताच त्यांना श्वास घेणं मुश्कील होत असे. डोक्टरांची अडचण रोझाच्या लक्षात येत होती. आपल्या बिछान्यावरून ती डिरांगचा चेहरा नीटपणे बघू शकत होती. मोठा मनमोहक युवक होता तो. डोक्यावरचे दाट काळे केस, हलकीशी दाढी, चेहरा कोमेजलेला असूनही आकर्षक होता.

मूळ लेखिका – सुश्री हंसा दीप

भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print