मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ३५ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – ३५ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

रेडिओ – भाग पहिला 

अमळनेर हे माझं सासरगाव. जेव्हा मी अमळनेरला जाते तेव्हा अगदी निवांत असते. देहाने आणि मनानेही. माझी धाकटी जाऊ सरोज, माझा तिथला मुक्काम आरामदायी व्हावा म्हणून अगदी मनापासून प्रयत्नशील असते. ती पहाटे लवकर उठते. प्रभात फेरफटका मारून येते. शांत झोपलेल्या मला- खुडबुडीचे आवाज येऊ नयेत म्हणून माझ्या रूमचा दरवाजा हलकेच ओढून घेते. खरं म्हणजे मी जागीच असते. माझा धाकटा दीर सुहास खराट्याने खरखर अंगण झाडत असतो. सरोज बाहेर गेली, आत आली, मागचा दरवाजा उघडला या सर्वांचे आवाज येत असतात पण तरीही मी उठत नाही. अशी घरी बनवलेल्या, घरच्या कपाशीच्या गादीवर अर्धवट झोपेतली जाग मी मजेत अनुभवत असते.

त्या पहाटेच्या वेळी फिरून आल्यानंतर पहिलं जर काय सरोज करत असेल तर ती तिचा छोटासा रेडिओ लावते. रेडिओवर सकाळची मंगल गाणी, भक्ती गीतं, भगवत् गीतेच्या अध्यायावरचं विवेचन वगैरे एकापाठोपाठ एक चालू असतं. मधून मधून निवेदिकेचा मंजुळ आवाजही येत असतो. सरोज रेडिओ काही कान देऊन ऐकत नसते पण दरम्यान ती चहापाणी, घरातला केरवारा, कपडे, भांडी यासारखी कामे रेडिओच्या तालात सहजपणे आवरत राहते, तेव्हा माझ्या मनात विचार येतो आजच्या दूरदर्शन, संगणक, मोबाईलच्या जमान्यातही सरोजसारखी रेडिओ ऐकणारी माणसं आहेतच की!

“ सकाळचे सहा वाजले आहेत, आम्ही जळगाव आकाशवाणी केंद्रावरून बोलत आहोत. ” या एका वाक्याने मी जवळजवळ ६० वर्षे मागे जाते.

रेडिओ

हा रेडिओ म्हणजे एक महत्त्वाचं स्थान आहे आमच्या बालपणातलं आणि जडघडणीतलंही. एक अखंड नातं त्या ध्वनीलहरींशी जुळलेलं आहे. त्यावेळी घरबसल्या करमणुकीचं रेडिओ हे एकमेव साधन होतं. घराघरात वाजणारा, बोलणारा रेडिओ म्हणजे त्या त्या परिवाराचा एक महत्त्वाचा सदस्य होता.

ऑल इंडिया रेडिओ. AIR.

आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पहाटेच्या प्रहरी वाजणाऱ्या सिग्नेचर ट्युननेच आम्ही जागे व्हायचो. आजही ती विशिष्ट वाद्यवृंदातील सुरमयी धुन कानात आहे आणि तिच्या आठवणीने अंतःकरणात खूप काहीतरी अनामिक अशा भावनांच्या लाटा उसळतात. बाल्य, कौमार्य आणि तारुण्य सारं काही आकाशवाणीच्या या धूनमधून उलगडत जातं.

रात्री झोपताना दिल्ली आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणारी संगीतसभाही सोबत असायचीच.

आता टेलिव्हिजन वरच्या अनेक दुष्ट, मतलबी, स्वार्थी, विकृत मानवी भावनांचा अविष्कार घडवणाऱ्या, मनोवृत्ती बिघडवणाऱ्या, वर्षानुवर्षे चालणाऱ्या अनेक दीर्घ मालिका बघताना सहज मनात येते, रेडिओ हे त्यावेळेचे केवळ मनोरंजनाचे साधन नव्हते तर ते साहित्य, संगीत, कलेच्या माध्यमातून सामाजिक संस्कार करण्याचे, समाज घडवण्याचे एक श्राव्य माध्यम होते. आनंदी जीवनाची दिशा दाखवणारं साधन होतं. नि:संशय..

गंमत- जम्मत नावाचा लहान मुलांसाठी एक सुंदर कार्यक्रम आकाशवाणी वरून प्रसारित केला जायचा. त्यातले नानुजी आणि मायाताई मला अजूनही आठवतात. त्यांचे ते प्रेमळ आवाज आजही कानात घुमतात. कितीतरी कथा, बालनाट्ये, बालगीते या कार्यक्रमातून ऐकली. इतिहास, भूगोल, विज्ञान, समाजशास्त्र यांचेही मनोरंजक पद्धतीने ज्ञानार्जन व्हायचे. याच कार्यक्रमातून एखादी ऐतिहासिक किंवा भौगोलिक प्रश्नपत्रिका दिलेली असायची. आम्ही ती उतरवून घ्यायचो आणि त्याची उत्तरे पत्राद्वारे मागवलेली असायची.

द्वारा केंद्राधिकारी, आकाशवाणी मुंबई केंद्र, गंमत जंमत विभाग. मुंबई ४ असा त्यांचा पत्ता असायचा. मी अनेक वेळा या पत्त्यावर प्रश्नपत्रिका सोडवून पत्रं पाठवलेली आहेत आणि पुढच्या कार्यक्रमातून जेव्हा उत्तरे बरोबर असलेल्या अनेक नावांबरोबर माझे नाव घेतले जायचे तेव्हा मला खूप गंमत वाटायची.

माझ्या आजीचे आवडते कार्यक्रम म्हणजे “कामगार सभा” आणि “कीर्तन”. ती रेडियोला कान लावून कीर्तन ऐकायची आणि तिच्याबरोबर आम्ही सुद्धा. या कीर्तनानेही आम्हाला नकळत घडवलेच की! नऊ रसात ओथंबलेले ते कीर्तन ऐकताना आम्ही पुरणकाळात, ऐतिहासिक काळात सहजपणे फेरफटका मारून आलोय. हरिभक्त परायण कीर्तनकाराच्या संगीतातून, गायनातून आम्ही विस्तृत अशा लोक परंपरेच्या हातात हात घालून नाचलो, बागडलो. टाळ चिपळ्यांसोबत गायलेलं “जय जय रामकृष्ण हारी” अजूनही कानात आहे. प्रत्येकवेळी निरुपण संपले की आम्हीही बुवांबरोबर “बोला! पुंडलिक वरदे हरी विठ्ठल।श्री ज्ञानदेव तुकाराम।। असा जयघोष करायचो.

या क्षणी मला रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांच्या वेळा, त्यात सहभागी असणाऱ्या आकाशवाणीच्या प्रत्येक कलाकारांची नावे आठवत नाहीत पण प्रहर आठवतात, आवाज आठवतात. त्या त्या कार्यक्रमाच्या वेळी वाजणारा वाद्यवृंद आठवतो आणि मन पुन्हा पुन्हा त्या काळात झेपावतं.

संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या, ऑल इंडिया रेडिओ दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही न चुकता ऐकायचो. सगळ्या घडामोडींचा ताजा आणि निखळपणे घेतलेला मागोवा आम्हाला समाजाबरोबर ठेवायचा. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून बातम्या देणाऱ्या “सुधा नरवणे” यांचा स्पष्ट, मोकळा आवाज आमच्या पिढीतली एकही व्यक्ती विसरू शकणार नाही.

अनेक संगीत नाटकांचं रेडिओवरूनच सुंदर सादरीकरण व्हायचं. कलाकारांच्या संवाद बोलीतूनच डोळ्यासमोर ती पात्रं, ते सीन, वातावरण साकारायचे आणि आभासी असला तरी प्रत्यक्ष रंगभूमीवर नाट्यप्रयोग पाहत असल्याचा आनंद या आकाशवाणीने आम्हाला दिला. गो. नी. दांडेकरांच्या “शितू” या गाजलेल्या कादंबरीचे अभिवाचनही आम्ही रेडिओ जवळ बसून ऐकले. काय आनंद दिला आहे आम्हाला या दर्जेदार कार्यक्रमाने ते कसं सांगू तुम्हाला?

हलक्या- फुलक्या, विनोदी श्रुतिका हे तर मुंबई आकाशवाणीचं खास वैशिष्ट्य. त्या संबंधात मला “प्रपंच” ही श्रुतिका मालिका आठवते. प्रत्येक भाग हा विशेष, हसवणारा आणि मनोरंजक असायचा. त्यातले टेकाडे भाऊजी आणि वहिनी यांच्यात घडणारे खुसखुशीत संवाद आठवले की आताही सहज हसू येतं. “बाळ कुरतडकर”, “नीलम प्रभू”, प्रभाकर (आडनाव आठवत नाही) हे कसलेले कलाकार त्यात सहभागी असायचे. काय जिवंतपणा असायचा त्यांच्या नाट्य सादरीकरणात!

तशी मी लहानच होते पण तरीही १९५५ ते १९५६ हे साल म्हणजे आकाशवाणीच्या इतिहासातले सुवर्णाचे पान म्हणून गाजले ते पक्के लक्षात आहे. पुणे आकाशवाणी केंद्राचे तत्कालीन अधिकारी, भारतीय शास्त्रीय संगीत आणि मराठी नाट्य संगीताचे जाणकार “सीताकांत लाड” यांनी रामायणावर आधारित साप्ताहिक कार्यक्रमाची संकल्पना मांडली. कवी गदिमा आणि संगीतकार, गायक सुधीर फडके यांच्या सहभागाने “गीत रामायण” हे हृदयात राहणारे संगीतमय महाकाव्य अस्तित्वात आले. एक एप्रिल १९५५ रोजी ऑल इंडिया रेडिओ पुणे केंद्रावरून रामनवमीच्या पवित्र प्रसंगी 

॥ स्वये श्री रामप्रभू ऐकती कुश लव रामायण गाती ॥

 या परमसुंदर, श्रवणीय गीताने गीतरामायण कार्यक्रम सुरू झाला. हा कार्यक्रम वर्षभर चालला. अधिक मासामुळे हे वर्ष ५६ अठवड्यांचं होतं म्हणून ५६ भागात हे “गीत रामायण” वर्षभर श्रोत्यांनी प्रचंड भावनात्मकतेने, श्रद्धेने आणि अपार आनंदाने ऐकले.

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तक्रार… लेखिका – सुश्री तेजस्विनी ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

? मनमंजुषेतून ?

🍃 तक्रार… लेखिका – सुश्री तेजस्विनी ☆ प्रस्तुती –  सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

का कळेना दाटते डोळ्यात पाणी..

मी खरे म्हणजे तशी दुःखात नाही..

तेवढा ओल्या सरींनी घात केला…

नाहीतर तशी माझी तक्रार नाही…

— स्पृहाच्या ह्या ओळी वाचताना मनात आलं… खरंच तक्रार करण्यासारखं असतं का खरच काही??आपलं आपल्यालाही जाणवत राहतं… की ही तक्रार नक्की कशासाठी?

अगदी पेपर वेळेवर आला नाही, आजूबाजूचे नीट काम करत नाहीत, कुणी माझ्याकडे लक्षच देत नाही.. अगदी साध्या साध्या विषयात आपण तक्रारीचा सूर लावतो… कुणी ऐकलं आणि नाही ऐकलं तरीही….

अगदी घरापासून, सोसायटीपर्यंत… समाजापासून देशापर्यंत… कितीतरी बाबतीत प्रत्यक्ष कृती, प्रयत्न न करता… फक्त नाराजी व्यक्त करत राहतो… कुणीतरी हे पटकन सगळ बदलावं… ही अपेक्षा…

दूध नाही आलं.. लेमन टी चा आस्वाद घ्यायला काय हरकत आहे?

कचरा उचलला नाही तर एक दिवस आपणच वन टू करत टाकून यावा… कामात बदल हे कितीतरी तक्रारींवरचं औषध आहे… हो ना?

प्रत्येक गोष्ट कुणीतरी कुठेतरी आपल्यासाठी करावी… ती ही आपल्या मर्जी प्रमाणे… तक्रारीचा जन्म बहुतेक तिथेच होत असावा…

तक्रार.. लाडिकही असू शकते… त्याची वाट पाहून, त्याच्या भेटीसाठी तरसणारी ती… तक्रार करते… किती वाट पहायची?

त्याचीही तक्रार.. रुसवा तो कधीतरी डोकावतोच… किती केलं तरी तुझं आपलं तेच… म्हणून अबोल झालेला तो…

तक्रार… एका पिढीने दुसऱ्या पिढीबद्दल केलेली… जराही चील मारत नाहीत हे मोठे लोक…

आमच्यावेळी असं नव्हतं म्हणत… तरुण पिढीची तक्रार… करून करून गुळगुळीत झालेली….

तक्रार… सौम्य कधी कधी टोकाची… टोचणारी… वादात, भांडणात रुपांतर होणारी…

तक्रार का होते आहे, खरं मुळ शोधून त्यावर नेमका उपाय करणं केव्हाही श्रेयस्कर!!!

खरं सांगू… तक्रार असावी, थोडासा रुसवा.. क्वचित.. लोणच्याच्या खारासारखा.. नात्याला चव यावी इतकाच…

तक्रार करण्याची आणि ऐकण्याची दोन्ही सवयी… घातकच!!!!

सर्वांगानं फुलून यावं वाटत असेल… माणूस आणि नातंही… तर… मनापासून स्वीकार… आणि नो तक्रार…

गुलाब, चाफा, मोगरा 

जुई जाई शप्पथ…

तुझ्यासारखे कुणीच नाही…

आईशप्पथ…

लेखिका : सुश्री तेजस्विनी

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रेमासाठी सारे काही… ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? मनमंजुषेतून ?

☆ प्रेमासाठी सारे काही… ☆ श्री संदीप काळे ☆

संत श्री. एम. मुळे वृंदावनचा फार जवळून संबंध आला. अनेक वेळा, अनेक दिवस वृंदावनला राहता आले. श्री. एम. मुळेच खूप सारे मित्र मिळाले. त्या मित्रांमध्ये वृंदावनमध्ये राहणारे राजेश तिवारी यांची खूप छान मैत्री झाली. अनेक वेळा त्यांच्यासोबत राहून तिवारी यांच्या नजरेने वृंदावन पाहिले. कृष्णभक्ती, अद्वितीय प्रेम आणि वृंदावन हा माणसाने एकदा तरी अनुभवावा असा अनोखा संगम आहे. त्या दिवशी राजेश यांचा फोन आला आणि मला म्हणाला, ‘संदीप, माझे लग्न ठरले आहे. तुला यायचे आहे’. मला राजेशच्या लग्नाला जाणे गरजेचे होते. कारण राजेशचे लग्न आमच्या सर्वांची मैत्रीण यूएसची श्रीकृष्णभक्त रुसीसोबत होणार होते. रुसीने पाच वर्षांपासून वृंदावनात श्रीकृष्ण भक्तीमध्ये स्वतःला समर्पित केले आहे.

रुसी आणि राजेशच्या लग्नाला वृंदावनात गेलो. दोन दिवस वृंदावनला मुक्काम होता. वृंदावनात फिरणे, तिथल्या माणसांशी बोलणे, यात जो आनंद मिळतो, तो अन्य कशातच नाही. लग्न लागल्यावर वृंदावनला फिरण्यासाठी बाहेर पडलो. वृंदावनात प्रत्येक वेळी नवीन काहीतरी अनुभव मिळतो. वृंदावनमधील मंदिर परिक्रमा हा माझा आवडता विषय.

मजल दरमजल माझा प्रवास सुरू होता. प्रेम- मंदिरापासून थोडे दूर गेल्यावर जप करत बसलेले एक जोडपे दिसले. दोघांचे लांब केस, दोघांमध्ये एक आसन, एकच पाण्याची बाटली, एकच बॅग, सारे काही दोघांत एकच होते. ते मी पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की हे एक जोडपे आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून मला वाटले, आपण यांच्याशी बोलले पाहिजे. मी त्यांच्या अवतीभोवती घुटमळत होतो. आत्ता जागे होतील, नंतर जागे होतील, याची मी वाट पाहत होतो. खूप वेळ झाला, पण ते काही त्यांच्या साधनेतून बाहेर यायला तयार नव्हते. मी तिथून निघणार, इतक्यात ते दोघेही जागे झाले.

मी त्यांना नमस्कार केला. त्यांना मी म्हणालो, ‘तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं, म्हणून ब-याच वेळापासून थांबलो आहे’.

त्या दोघांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहिले. त्यातली महिला मला म्हणाली, ‘सांगा ना काय बोलायचं आहे तुम्हाला? 

‘तुम्ही जी साधना करताय, तुम्ही जी ध्यानधारणा करताय, त्यातून तुम्हाला खरंच ईश्वराची भेट होते का? या साधनेने तुम्हाला समाधान मिळते का? का तुम्ही अन्य कुठल्या कारणास्तव ध्यानधारणा करताय?’ त्या दोघांनीही एकमेकांकडे पाहत आणि स्मितहास्य करत मला उत्तर दिलं. त्या जोडीमधला तो पुरुष मला म्हणाला, ‘अहो, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गोष्टीत ईश्वर आहेच. तुम्ही ध्यानधारणा करा, तपस्या करा अथवा करू नका. त्याची आणि तुमची भेट होतच असते. मन एकाग्र ठेवून श्रीकृष्णाला भेटण्याची आस ठेवली, तर तो भेटतोच भेटतो’.

मग काय मी प्रश्न विचारत गेलो आणि ते उत्तर देत गेले. ते कुठे राहतात, ते काय करतात, ते कधीपासून साधू बनलेत, इथपासून ते त्यांचं पूर्वायुष्य मी त्यांच्याकडून जाणून घेत होतो. आयुष्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर आल्यावर त्या दोघांनी साधूच्या वेशात राहणं पसंत केले. ते दोघेही आयटी इंजिनियर साधू का बनले? त्या दोघांची खूप करुण कहाणी मी ऐकली आणि माझं मन एकदम सुन्न झालं.

प्रेमिला शर्मा आणि सिद्धार्थ अवस्थी हे दोघेही अगदी जवळचे नातलग. लहानाचे मोठे ते उत्तर प्रदेशात झाले. उच्च शिक्षणासाठी मुंबईला गेले. तिथून दोघेही आयटी इंजिनियर झाले. दोघेही मुंबईत काम करू लागले. एकमेकांची ओळख होती. त्या ओळखीतून दोघांचे प्रेम झाले आणि ते प्रेम लग्नाजवळ येऊन थांबले.

प्रेमिलाला वडील नाहीत. प्रेमिलाची आई तिच्या एका बहिणीला घेऊन उत्तर प्रदेशात राहते. प्रेमिलाने जेव्हा सिद्धार्थचा विषय तिच्या आईला सांगितला, तेव्हा प्रेमिलाच्या आईच्या तळपायाची आग मस्तकात गेली. प्रेमिलाचा लग्नाविषयीचा निर्णय आईला अजिबात मान्य नव्हता. ज्या दिवशी प्रेमिलाने आईला लग्नाचा विषय सांगितला, त्याच्या दुसऱ्या दिवशी आईने उत्तर प्रदेशातून निघून थेट मुंबई गाठली. प्रेमिलाला पकडून तिने गावाकडे आणले. तिच्या लग्नाची इतर ठिकाणी बोलणी सुरू झाली. प्रेमिलाला तर सिद्धार्थबरोबरच लग्न करायचे होते. आईच्या ठाम नकारामुळे ते लग्न होणार नाही, हे निश्चित होते. प्रेमिलाने घरातल्या घरात दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला, तरीही तिची आई तिचे ऐकायला तयार नव्हती.

एकदा भांडणांत बोलता बोलता आई प्रेमिलाला म्हणाली, ‘तू कुठेतरी एखाद्या मंदिरावर साध्वी म्हणून जा, पण मी त्या मुलासोबत तुझे लग्न करू शकत नाही. तो माझ्या अशा नात्यातला आहे की, त्या नात्यांत तुमच्या दोघांचं नातं नवरा-बायकोचं होऊच शकत नाही. बहीण-भावाचे होते. तुम्ही लग्न केलं, तर मी लोकांना काय तोंड दाखवू? समाजात माझी इज्जत राहणार नाही. तुझ्या लग्नाला कोणी येणार नाही. तुझ्या बहिणीचं लग्न होणार नाही. त्यावर प्रेमिला म्हणाली, ‘ठीक आहे. मी मंदिरात साध्वी म्हणून राहते’. प्रेमिलाच्या आईला वाटले, प्रेमात पडलेली ही तरुण मुलगी थोडीच मंदिरात साध्वी म्हणून राहणार आहे? एकीकडे प्रेमिलाची आई तिचं लग्न कुठं जमेल का, या विवंचनेत होती, तर दुसरीकडे प्रेमिला साध्वी बनण्यासाठी दीक्षा कुठे घ्यायची? त्याची काय काय नियमावली असते? कोणाकडे जावे लागते? याची सगळी माहिती काढून ठेवत होती.

एके दिवशी प्रेमिलाने तिच्या आईला सांगितले की, मी आता साध्वी म्हणून मंदिरामध्ये बसणार आहे. प्रेमिलाच्या आईला प्रेमिलाचा निर्णय ऐकून एकदम धक्काच बसला, पण प्रेमिला तिच्या निर्णयावर ठाम होती. आत्महत्या, सामाजिक प्रतिष्ठा, आईचे मत, नातेवाईकांचे मत, सिद्धार्थला धोका या सगळ्या शक्यतांवर मात करायची असेल तर, आईने रागात का होईना मला सुचवलेला साध्वी बनण्याचा पर्याय जिवंत राहण्यासाठी योग्य मार्ग ठरू शकतो. त्यातून मला आवडणाऱ्या श्रीकृष्णाची भक्ती करता येईल. सिद्धार्थच्या प्रेमाचे पावित्र्यही मला जपता येईल, या भावनेतून प्रेमिलाने साध्वी बनण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतरही प्रेमिलाची आई ‘मी सिद्धार्थशी लग्न लावणार नाही’, या मतावर ठाम होती.

प्रेमिलाला मुंबईवरून गावी नेताना प्रेमिलाची आई तिला सोबत घेऊनच सिद्धार्थला भेटली. तिने सिद्धार्थला तंबी देत मारहाण केली आणि बजावून सांगितलं की, माझ्या मुलीला मी विहिरीत ढकलून देईन, पण तुझ्यासोबत तिचं लग्न करणार नाही. तुझ्या आईवडलांनी गावाकडे काय प्रताप केलेत, हे माहिती आहे ना? तुझे आणि हिचे नाते काय आहे हे माहिती आहे ना? यानंतर प्रेमिलाशी बोलायचा किंवा भेटायचा प्रयत्न केलास, तर मी तिचा मुडदा पाडेन. मीही आत्महत्या करीन आणि त्याची सगळी जबाबदारी तुझ्यावर असेल’.

सिद्धार्थला वाटलं, काहीही झालं, तरी प्रेमिलावरचं आपलं प्रेम कमी होणार नाही. तिच्याशिवाय आपण इतर कोणावर प्रेम करू शकत नाही. तिच्यासोबत लग्न करू शकत नाही. ती जिथे कुठे असेल तिथे सुखी राहावी, या भावनेतून मोठ्या जड अंत:करणाने सिद्धार्थने प्रेमिलाला समंजसपणे निरोप दिला.

तिकडे वृंदावनमध्ये जाऊन प्रेमिला साध्वी बनली. सिद्धार्थच्या प्रेमाचं पावित्र्य राखण्यासाठी तिनं हा निर्णय घेतला होता. ही गोष्ट प्रेमिलाच्या मैत्रिणीकडून बऱ्याच दिवसांनी सिद्धार्थला कळली. सिद्धार्थने खूप शोध घेतल्यावर त्याला प्रेमिला भेटली, ती साध्वीच्या वेशात. घडलेला सगळा प्रकार तिने सांगितला. ‘तू तुझे आयुष्य आनंदाने जग. आता मी हा निर्णय कायम ठेवून आयुष्यभर श्रीकृष्णाचं ध्यान करत या वृंदावनमध्येच राहणार आहे’, असं प्रेमिलानं सिद्धार्थला सांगितलं.

सिद्धार्थ प्रेमिलाला म्हणाला, ‘माझ्या आयुष्याला तुझ्याशिवाय काहीच अर्थ नाही. आपलं प्रेम काही विसरून जाण्यासाठी नव्हतं किंवा काहीतरी मिळवण्यासाठीही नव्हतं. आपलं प्रेम हे जन्मोजन्मीच्या गाठी आयुष्यभर कायम राहाव्यात यासाठी झालं होतं. तू जो साध्वी बनण्याचा निर्णय घेतलेला आहेस, तसाच मीही साधू बनण्याचा निर्णय घेतो. साधू आणि साध्वी बनून आपण श्रीकृष्णाची भक्ती करत राहू. नवरा-बायको होऊ शकलो नाही तर काय झाले? श्रीकृष्णाचे भक्त म्हणून सोबत राहू.

दोन-चार दिवस प्रेमिलाने सिद्धार्थची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण सिद्धार्थ काही ऐकायला तयार नव्हता.

शेवटी सिद्धार्थने साधू बनण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या चार वर्षांपासून हे दोघे जण साधू-साध्वी बनून वृंदावनमध्ये तपस्या करत असतात. चार ठिकाणी भिक्षा मागतात. पोटापुरतं जेवढं मिळेल तेवढं खातात. रात्री वृंदावनच्या श्रीकृष्ण आश्रमात मुक्काम करतात. साधू आणि साध्वीचे पावित्र्य त्या दोघांनीही जपले आहे.

प्रेमिला म्हणाली, ‘मी लहानपणापासून कृष्णभक्त आहे. श्रीकृष्णच आपल्यासाठी सर्व काही आहे, या भावनेने मी आयुष्याची बावीस वर्षे काढली. अपघाताने का होईना मी पूर्णवेळ कृष्णभक्त होईन, असं कधी वाटलं नव्हतं. मी सिद्धार्थमध्येसुद्धा श्रीकृष्ण पाहायचे. सिद्धार्थच्या मला जपण्याच्या पद्धतीत मला श्रीकृष्ण दिसायचे. दुर्दैवाने सिद्धार्थ माझा होऊ शकला नाही, पण माझी श्रीकृष्णभक्ती सिद्धार्थच्या सहवासाने आणि माझ्या समर्पणाने कायम राहिली.

सिद्धार्थ म्हणाला, ‘अहो, जगण्यासाठी लागते तरी काय? सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आनंदी आहात का? तुम्ही सुखी आहात का? हे खूप महत्त्वाचे आहे. मी आयटी इंजिनियर होतो. ती आयटी इंजिनिअर होती. आमच्या आयुष्याचे अंतिम ध्येय काय होतं? ते एकमेकांसोबत खूश राहायचं. मुंबईत राहिलो असतो, तर मोठ्या इमारतीमध्ये राहिलो असतो. आलिशान गाडीत फिरलो असतो. त्या सर्वांतसुद्धा सुख शोधणे हेच महत्त्वाचे ध्येय राहिले असते. इथे श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये सुख शोधायची गरजच भासत नाही. सुख हे आपोआपच मिळत जाते. माझे आणि प्रेमिलाचे प्रेम हे तेव्हाही होते, आताही आहे. तेव्हा त्या प्रेमात चांगुलपणाच्या आणाभाका घेत आकाशाला गवसणी घालणारे भौतिक सुखाचे स्वप्न पाहिले होते. आता त्या आणाभाका कायम आहेत. फरक इतकाच की, आता श्रीकृष्णाच्या भक्तीत विलीन होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्या मार्गाने वाटचाल सुरू आहे’.

ते दोघेजण माझ्याशी बोलत असताना मी विचारले, ‘तुमच्या नातेवाईकांचे काय झाले? सिद्धार्थच्या घरच्यांनी विरोध केला नाही का?’ प्रेमिला म्हणाली, ‘जसं माझ्याकडे झालं, तसं त्याच्याकडेही झालं’. डोळ्यात अश्रू आणत, प्रेमीला म्हणाली, ‘एका वर्षानंतर माझी आई वारली. बहिणीची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. आईकडे फार काही नव्हतं. जे काही होतं, ते मी विकलं आणि आनंदात बहिणीचं लग्न केलं. सिद्धार्थला आई-वडील नव्हते. त्यानं त्याच्या मोठ्या भावाच्या नावावर त्याची सगळी मालमत्ता करून दिली आणि अगदी सहजतेनं, आनंदात माझ्यासोबत येऊन भगवे वस्त्र परिधान केले’.

मी त्या दोघांनाही अजून एक प्रश्न विचारला, ‘तुम्ही हे सगळं आपल्या प्रेमासाठी केलं का श्रीकृष्णासाठी?’ त्या दोघांचेही उत्तर अतिशय समर्पक होते. ते म्हणाले, ‘आम्ही जगत होतो श्रीकृष्णासाठी. आमचं प्रेमही श्रीकृष्णासारखं होतं आणि आम्ही आताही जे काही करतो ते श्रीकृष्णासारखं आणि श्रीकृष्णासाठीच करतो’.

सिद्धार्थ आणि प्रेमिला या दोघांचाही खूप छळ झाला होता. नियतीने आणि नातेवाईकांनी त्यांच्या अनेक प्रकारे परीक्षा पाहिल्या होत्या. त्या सगळ्या परीक्षांमध्ये सफल होता होता त्या दोघांनी प्रेमासाठी जे काही केलं ते अतुलनीय असंच होतं.

मी त्या दोघांचा निरोप घेऊन निघालो. निघताना माझ्या मनात एकच प्रश्न होता की, अजूनही किती सामाजिक प्रतिष्ठेच्या रेखा प्रेमाच्या आड येतील? त्यातून जे घडते, त्याचा आपण विचारही करू शकत नाही. तुमच्या अवतीभोवती असेच प्रेम करणारी अनेक जोडपी असतील. त्यांचे प्रेम अगदी राधा-मीरा श्रीकृष्णासारखं असेल. अशा जोडप्यांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी आपण निश्चितपणे मदत करणार ना?

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ती परत आली…! ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ ती परत आली…! ☆ सुश्री शीला पतकी 

सकाळी उठल्याबरोबर सौ ने ऑर्डर दिली “अहो ऐकलत का?…”

मी म्हणालो “हो तुझाच तर ऐकतोय बोल.” 

“ काही नाही खाली वाण्याच्या दुकानातून दोन नारळ घेऊन या आणि ते सोलून आणा.. तुम्हाला सोलता येत नाहीत.” 

मी.. “कशासाठी?” नको तो प्रश्न मी विचारलाच..

ती म्हणाली.. “ एक.. संध्याकाळी मारुतीला फोडा आणि एक सकाळी फोडून मी गणपती बाप्पाला नैवेद्याचे मोदक करणार आहे “ ती म्हणाली. “ सुनीता विल्यम्स परत आली. मी देवाला बोलले होते ती सुखरूप परत येऊ दे तुला अकरा मोदकांचा नैवेद्य दाखवेन.. !” 

“ तिच्यासाठी एवढा नवस बोलण्याचा काय काम?… “

“ अहो जरा काहीतरी वाटू द्या नवीन नवीन संशोधनासाठी ती बाई नऊ महिने अडकून पडली तिथे… बाई म्हणून परत आली.. हो ओढ असते ना आम्हा बायकांना घराची. तिच्याबरोबर तो बाप्या एकटा असता ना तर कधीच मरून गेला असता.. बाई होती म्हणून सगळ धीराने निभावलं.. !”

“ एवढं काही नाही हं.. ” मी म्हटलं !..

“ गप्प बसा.. बाथरूम मध्ये एकदा अडकून पडला होता तर केवढा गोंधळ केला. चार धक्के बाहेरून लागवले तेव्हा ती बाथरूमची कडी निघाली.. पंधरा मिनिटात पॅनिक झाला होता तुम्ही… नऊ महिने तिने बिचारीने एकटीनं घीराने काढले कारण तिला दिसत होत.. आपलं घर ! आठ दिवस माहेरी गेले आणि दोन दिवसात परत आले तर तुम्ही म्हणता का एवढ्या लवकर आलीस? अहो ओढ असते बाईला घरची.. माहेर वगैरे पहिले काही वर्ष.. तुम्हाला कळायची नाही आम्हा बायकांची ओढ…. ” 

“ पण मग त्याच्यासाठी गणपतीला कशाला नैवेद्य दाखवायचा अरे विज्ञानवादी तरी हो नाहीतर अध्यात्मवादी तरी हो.. ! “

“ मी कुठलाही वाद घालत नाही लक्षात ठेवा. विज्ञान हवंच ते आपल्याला प्रगतीपथावर नेणार आहे पण मनस्वास्थ.. त्याला अध्यात्मही हवं ! आम्हा बायकांची भाबडी श्रद्धा असते आणि तीच तुम्हाला कितीतरी वेळा तरुन नेते.. पहा सुनीताबाईसुद्धा आपल्याबरोबर भगवद्गीता, वेद, गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन गेल्या होत्या म्हणून सुखरूप परत आल्या. मनोधैर्य वाढवणाऱ्या त्या गोष्टी होत्या त्यांना खात्री होती. आपल्याबरोबर देव आहे आणि आम्हा बायकांची श्रद्धा बरोबर काम करत असते बरं !. तुम्हाला ठाऊक आहे का त्या यानात एक तरी बाई का पाठवतात?.. ” 

“ का का? “ मी माझा अज्ञान प्रकट करत आजीजीने म्हणालो..

ती.. ” कारण बाईच्या जातीला ओढ असते घराची. अंतराळात गेलेली पहिली लायका कुत्री होती.. कुत्री.. मादी जातीची आणि बायका चिवट असतात बरं का.. कठीणातल्या कठीण परिस्थितीला तोंड देऊन विजय मिळवण्याचं कसब परमेश्वराने बाईला दिले बाई.. अशी सहजासहजी मरत सुद्धा नाही… ती लढते निकरानं शेवटपर्यंत.. ”.. आणि अजून बरच काही ती बोलत होती…

… मी मनात म्हणालो ‘ कुठून हिला विचारलं.. मुकाट्याने नारळ आणले असते तर झालं असत ना.. खाल्ल्या की नाही शिव्या ‘.. शेवटी मी तिला शरण गेलो आणि म्हणालो “ बाई पिशवी दे आणि पैसे दे. नारळ आणतो.. अगदी सोलून आणतो पण तू मला बोलून घेऊ नकोस.. सखे तू आहेस म्हणून माझं सगळं व्यवस्थित चालले बरं..”

अशी शरणागतीची चार वाक्य टाकून मी मोकळा झालो आणि आज जेवायला मोदक मिळणार या आनंदात सुनीता विल्यम्सचे आभार मानून दुकानाकडे चालू लागलो…!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अजून मला मागणी आहे… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

??

☆ अजून मला मागणी आहे…  ☆ श्री सुहास सोहोनी

अजून मला मागणी आहे – – –

तेव्हा वेळ पुरत नसे आता जाता जात नाही.. तेव्हा कामं संपत नव्हती.. आता हाती कामच नाही —

या खोलीतून त्या खोलीत बिनकामाच्या येरझार्‍या.. गादीवर झोपू का खुर्चीत बसू.. कां व्हरांड्यात मारू फेऱ्या….

खायला काळ झालोय् का.. भुईला भार होतोय् का.. जगायला कारण उरलं का नाही.. काय करावं ते कळतंच नाही —

😣

वर्‍हाडकल्डा मित्तर बोलला.. नाय् ता इच्च्यार नको रे बाप्पा.. नन्नाचा पाढा काहून गायला.. देव तुजेवर व्हईल नं खप्पा —

तुये अशे रे उफराट बोलने माया त बिल्कुल नायच पटले.. तुयासारक्या टग्या बाप्यांनी होयाचे नाय् कदी केराचे टोपले —

👍

मालवणी दोस्त ऐकुन धावला.. मिठी मारून प्रेमानं बोलला.. वसाड्या तुजा म्हनना तरी काय.. शाळ्याचो पानी पी, ग्वाड किती हाय… ! 

नारल सोलुक झापा इणुक येळ माका पुरूचा नाय.. घरात बसून आंबट तोंडान् डोक्याचा खोबरा करूचा नाय्…

👍

तेवढ्यात आमची ही कण्हत आली.. कमरेत तिच्या उसण भरली.. झंडू बाम देत म्हणाली.. ” थोडसं चोळून द्याल का ?” तेवढ्यात मुलगा घाईत आला.. हातात कागद ठेवित म्हणाला “दहा कॉपीज् प्रिंटर वरून पटकन् काढून द्याल कां?”

– – तेवढ्यात सुनबाई ओटीवर आली. पिठाचा डबा आदळत म्हणाली ” झांकण फिट्ट बसलंय् घट्ट

प्लीज् उघडून द्याल कां?”

– – तेवढ्यात नातू आला रडत, ” चित्र काढायला मला नाही जमत, सूर्य, डोंगर, नि उडते पक्षी, काढून द्या ना छोटिशी नक्षी. “

– – – आणि अचानक डोक्यात लखकन् वीज चमकली.. माझं मला उमगलं आहे.. लहान मोठ्या कामांसाठी अजून मला मागणी आहे !!

…. अजून मला मागणी आहे !!

सगळंच काही संपलं नाहीये कळून आता चुकलं आहे.. आपली कामं नसली तरीही दुसऱ्यांना मदत करायची आहे !

नकारी विचार करायचा नाय्.. सकारी विचार सोडायचा नाय.. केराचं टोपलं होयाचं नसतं.. शाळ्याचं पानी गोडंच असतं

आयुष्य शहाळ्यासारखं असतं.. त्याचं मळकं टोपलं करायचं नसतं.

आणि — 

– – – आणि आपणच आपली किंमत राखली तर जग आपल्या मागे धावतं !!

🍁 🍁

© श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फिरुनी नवी जन्मेन मी… – लेखिका : सुश्री मृणाल धोंगडे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

सौ. बिल्वा शुभम् अकोलकर

? मनमंजुषेतून ?

☆ फिरुनी नवी जन्मेन मी… – लेखिका : सुश्री मृणाल धोंगडे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

फिरुनी नवी जन्मेन मी…

आपण साधं कोपऱ्यावर जायचं तर घरी सांगून, कधी परत येणार त्याप्रमाणे किल्ल्या, कामाच्या बायका सगळ्या सोयी लावून निघतो… परगावी जाणार असलो आणि घरच्यांचा स्वैपाक येण्याचा उजेड असेल तर दोन दिवस असतील तर दोन भाज्या extra करून, श्रीखंड आणून ठेवून जातो.. जरा जास्त दिवस जाणार असू तर चिवडे लाडू चकल्या असे डबे भरून, स्वयंपाकाच्या बाई नसतील तर रोजच्या जेवणाचा सरळ डबा लावून, मुलांना १७६० गुणिले काही सहस्र सूचना देऊन, कामवाल्या बायकांना दांड्या मारू नका म्हणून धमकावून मग आपण जिथे जाणार असू त्याप्रमाणे आपल्या bag मध्ये अनंत गोष्टी भरून, शेजारी पाजारी, मैत्रिणी, घरातले छोटे, मोठे सगळ्यांचा निरोप घेऊन एकदाच्या बाहेर पडतो… परत येणार असू त्या तारखेनंतरचेही अनंत कार्यक्रम ठरवूनच आपण एकदाचे बाहेर पडतो…

ही अशीच बाहेर पडली असेल का? जरा तिथली देखरेख आणि थोडं पुढचं संशोधन करते आणि येतेच असं म्हणून ?? घरी दारी काय काय व्यवस्था लावून गेली असेल? तिला निघताना जाणवलं असेल का ती कधी परत येणार हे तिच्या हातात नाही ? तिची तयारी वेगळी, तिची प्रवासाची गाडी नव्हे तर यान, तिचं जाणं लग्न, मुंज, ट्रीप किंवा सेमिनार conference ला नव्हे… तिचं जाणं.. थेट अंतराळात… येणं… सगळं नीट असेल तर नियोजनानुसार.. नाहीतर… काहीच माहीत नाही…

काय असेल तिची मानसिक अवस्था… धडाडी आणि बुद्धिमत्ता आहेच हो तिच्याकडे पण स्त्रीच ना ती.. हुरहुर, भीती, भविष्याच्या अनिश्चिततेचे सावट, वाढणारे वय, तिथे अडकल्यावर झालेली घालमेल… काय काय सुरू असेल तिच्या मनात…

पण अशी अंतरिक्षात झेंडे लावणारी सुनिता आज सुखरूप परत आली.. तिनं धाडसाने ठेवलेलं प्रस्थान शास्त्र, तंत्रज्ञान आणि परमेश्वराची इच्छा यांच्यामुळे सुफळ संपूर्ण झाले..

कधीही न पाहिलेली ती सुनीता… पण ती परत आल्याचा आनंद आज प्रत्येकाला आहे.. ९ महिन्याने परत आली… जणु नवा जन्म घेऊन… तुझे पृथ्वीवर खूप खूप स्वागत सुनिता!!!

एकाच या जन्मी जणु फिरुनी नवी जन्मेन मी… या गाण्याचा आज वेगळाच अर्थ समजला मला..

लेखिका : सुश्री मृणाल धोंगडे

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सहज सुचलं म्हणून… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

??

☆ ✍️ सहज सुचलं म्हणून… ☆ सुश्री अपर्णा परांजपे

विश्वास व श्रध्दा यांचा संबंध बुद्धी व हृदय दोघांशीही आहे. बुद्धीला जे पटतं ते व तसंच घडलं की आनंद मिळतो कारण तीच आपली तळमळ असते. मन म्हणतं पहा हे असंच व्हायला हवं होतं पण एक महत्त्वाचा विषय यात दुर्लक्षित रहातो तो म्हणजे हृदयाचा कल ! हृदय या आनंदात आनंदी आहे की नाही हा विचार व्हायलाच हवा. ही गरज आहे पण त्या आवाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही असं बुध्दी मनाला पटवत रहाते. आंतरिक तळमळ व बौद्धिक इच्छा वेगळ्या आहेत हे निश्चित ! अन्यथा जे जे मनासारखे झाले आहे त्यातून संपूर्ण समाधान मिळालेच असते व हुरहूर संपली असती. पण तसे का होत नाही याचा विचार विवेकाने करणे क्रमप्राप्त आहे.

याउलट फक्त हृदयाचा कौल घेतला तर लक्षात येतं की त्याला काहीच नको आहे. त्याला देण्यात सुख आहे. त्याचा स्वभावच प्रेम, भक्ती, समर्पण आहे. व आहे त्यातही तो समाधानी आहे पण मन स्वस्थ बसू देत नाही. वेगवेगळे विकार, तुलना, इर्षा, मीच का? हे शक्य नाही असेच ठसवत जाते व हृदयाकडे दुर्लक्ष होते. ही मानवी अवस्था संत, सज्जन ओळखतात व सत्याचा एक गुरुमंत्र देतात. पण बुद्धी तो ही आपल्या आनंदाच्या कल्पनांवर घासून पहातं व ती वचने खरी नाहीत असं मनाला पटवतं.

हाच भ्रमाचा खेळ सुरू असतो. तो आपण स्वतः स्वतः च्या बुध्दीला पटवणे व तिला हृदयाकडे वळवणे हा स्वधर्म आहे.

हृदयस्थ परमात्मा मग खूष होऊन “सदा सुखी भव” चा आशीर्वाद देतो जो स्वतःचा स्वतः ला जाणवतो.

हेच तर हवंय !!

*

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डोंगल ते वाय फाय (बालपण)… भाग – ६ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी  ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? मनमंजुषेतून ?

डोंगल ते वाय फाय (बालपण) भाग – ६ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

काळ बदलत गेला. समीकरण बदलत गेली. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. जेथे साधं पोस्ट कार्ड मिळायला दोन चार दिवसाचा, कदाचित आठ दिवस लागायचे, तिथे बातमी कळायला काही मिनिट पण लागतं नाही. रेडिओ गेला, ट्रानझीस्टर पण गेला. टेप रेकॉर्डिंग गेल. ग्रामो फोन गेला. आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आला, जग झटक्यात बदललं. त्याच रुपड बदललं.

इंटरनेट पण मोबाईलच्या कुशीत लोळू लागला. क्षणात हिकडची बातमी तिकडं. पोस्टाची काम कमी झाली. पोस्टकार्ड, अंतर्देशीय गेल.

एका मोबाईल मध्ये घड्याळ, कॅमेरा, internet, फोटो अल्बम, इन्स्टा ग्राम, फेसबुक अश्या नानाविध गोष्टीच घबाड हाती लागलं.

गेम्स नावाचा प्राणी तिथेच शिरला आणि बालपण माती मोल झालं. व्हाट्सअपनं तर जगण मुश्किल केल. माणुसकी गहाण पडली. व्हाट्सअप, फेसबुक ची व्यसन जडली. जी दारू पेक्षा घातक ठरली.

माणसातील संवाद आता स्क्रीन वर आला. एवढंच काय टीव्ही पण मोबाइलला अडकला. विसंवाद चालू झाला. घरात कोण आला कोण गेला हे पण कळल नाही. सदा भासमान दुनिया झाली. फायदे झाले तितकेच तोटे पण झाले. सतत खाली मान घालून माणुसकी टच स्क्रीन खेळायला लागला.

वाय फाय, डोंगल हे परवलीचे शब्द झाले. लहान मुलांच्या हातात मोबाईल आला आणि बालपण हरवलं गेल. वयाच्या दोन चार वर्षाच्या मुलांच्या हातात गेम्स चालू झाले. त्याशिवाय पालकांची कामे खोळाम्बत होती. खेळतोय खेळू दे. गप्प तरी बसेल. त्याच्या व्यसनाने बाळ जेवण करेल, खाईल पीईल. ह्या कारणाने ते बालक ज्यास्त अधीन होतं गेले. पालकांना कळत होतं पण वळत नव्हतं. बाहेर बांगडण्याचे खेळायचे दिवस हरवले. आणि बालपण संपुष्टात आल! चार चौघात बोलायचे हसायचे दिवस सरले. बाळ ऐकलं कोंड होतं गेल ते कळल नाही. घरी पाहुणे मंडळी आली गेली त्याच्या खिजगणतीत नव्हते. त्यात शिशुना पाळणा घर हे नवीनच तंत्र ज्ञान निर्माण केलं गेल!

ते तिथे काय करतय काय नाही हे देव जाणे! बाळ मोठं झाले घरी राहिले तर त्याला ब्लु व्हेल सारख्या गेम्सच व्यसन! बाहेरची शुद्ध हवा, शरीराला होणारा व्यायाम, ओळखी, मौज मजा ह्याला हरवून बसलाय. हेच काय ते संशोधन, हीच का ती मानवाची प्रगती! नुसते बालपणच नाही तर माणुसकी, आत्मीयता हरवलेली ही पिढी पुढे जाऊन काय काय करेल, ह्याची कल्पना सुद्धा करावी असे वाटतं नाही. सदा मान वाकडी मंडळी डोळ्याला चस्मा, येणारे पाठीला कुबड, कम्बर दुःखी इत्यादी गोष्टींची सांगड घालत देश प्रगती पथावर जात आहे. आधुनिक तंत्र ज्ञान काळाची गरज आहे, हे जरी खरे असले तरी, येणारी पिढी ही रोगग्रस्त असेल एवढ नक्कीच! त्वरित मिळत असलेल्या गोष्टीची किम्मत मात्र कमी होतं आहे का युज अँड थ्रो च्या जमान्यात माणुसकी पण गहाण पडत आहे, हे तितकेच खरे.

— समाप्त —  

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “टमाटे कसे आहेत?…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

 

🔆 मनमंजुषेतून 🔆

☆ “टमाटे कसे आहेत?…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

भाजीच्या दुकानात आपण नेहमीच जात असतो. कधी एकटे जातो, कधी बरोबर बायको असते किंवा नवरा असतो. पण बऱ्याच वेळेला आपण आपल्याच तंद्री मध्ये असतो. त्यामुळे आसपास घडणाऱ्या मजेशीर घटनांना आपण मुकत असतो. आपण नेहमीच वर्तमान काळात राहू शकलो, आणि आसपास घडणाऱ्या घटनांशी समरस होऊ शकलो, तर भरपूर आनंद मिळू शकतो, हे नक्की. हा लेख आणि ही घटना यावरच आहे.

—–

आज सकाळी फिरून येतांना नेहेमीप्रमाणे साने डेअरी मध्ये दूध घेतले. मुलीकडे सकाळी जातांना भाजी न्यायाची होती, म्हणून बायको बाजूच्याच भाजीच्या दुकानात भाजी घ्यायला गेली. दुकानदार तरुण मुलगाच होता. मी तिथेच उभा होतो.. तेवढ्यात एक मॅडम दुकानात आल्या —

मॅडम : अरे, टमाटे कसे आहेत ? 

दुकानदार मुलगा : मॅडम, टमाटे एकदम मस्त आहेत. आज न्याल तर पुन्हा नक्की परत याल.

मॅडम : अरे कसे म्हणजे तसे कसे नाही. कसे आहेत ?

मुलगा : मॅडम लाल आहेत आणि हिरवे पण आहेत. घरी गेल्यावर लगीच सार किंवा कोशिंबीर करायची असेल, तर पूर्ण पिकलेले लाल घेऊन जा. भाजी करायची असेल तर हिरवे टमाटे न्या. थोडे कमी पिकलेले पण आहेत. एकदम लहान आहेत आणि मोठे पण आहेत. कुठले देऊ?

मॅडम : अरे कसे आहेत, म्हणजे कसे दिले ? 

मुलगा : मॅडम, अजून दिले कुठे ! आताच तर दुकान उघडले आहे. आताच एका मॅडम ना भेंडी दिली, एकांना पालक दिला. टमाटो ची बोहोनी तूम्हीच करा. किती देऊ?

मॅडम : अरे, पण देणार कसे, ते सांग ना.

मुलगा : मॅडम वजन करूनच देणार. तुमच्याकडे पिशवी असेल तर त्यात देईन. नाहीतर आमची कापडी पिशवी घेऊन जा आणि उद्या पुनः भाजी न्यायला याल, तेव्हा पिशवी घेऊन या. पिशवी ८ रु ची आहे, पण मी फक्त ५ रु डिपॉझिट घेतो. आता प्लॅस्टिक कॅरी बॅग ठेवत नाही, कारण त्यावर बंदी आहे. आम्हाला थोडा त्रास होतो, पण बंदी योग्यचं आहे. कुठल्याही धोरणाला विरोध करायचा, म्हणून विरोध करणे, हे काही बरोबर वाटत नाही. आपण सगळ्यांनी बंदी चे पालन केले, तर शेवटी फायदा आपलाच आहे. बोला किती देऊ टमाटे ?

मॅडम : अरे भाव सांगशील का नाही ! भाव केल्याशिवाय कसे घेणार !

मुलगा : मॅडम, इथे भाव होत नाही. एकदम फिक्स्ड रेट, असे म्हणून त्यांनी बाजूच्या मोठ्या बोर्ड कडे बोट दाखवले.

बोर्ड वर लिहिले होते “इथे भाव होणार नाही, वाजवी भावात उत्तम माल इथे मिळेल. आज भाजी न्याल, तर रोजचं भाजी न्यायला इथेच याल”. खाली भाज्यांची नावे व त्यांचा किलोचा भाव लिहिलेला होता.

मॅडम नी बोर्ड बघितला आणि म्हणाल्या १ किलो लाल टमाटे दे.

मॅडम : अरे आधीच बोर्ड दाखवायचा नाही का 

मुलगा : मॅडम, तुम्ही टमाटो चा रेट विचारलाच कुठे !

भाजी घेऊन मॅडम बाहेर पडल्या आणि बायको पण भाजी घेऊन बाहेर आली.

 मॅडम आणि दुकानदार मुलाचा संवाद, हे आपल्या सगळ्यांचेच विचारांची देवाण – घेवाण करण्याचे एक बोलके उदाहरण आहे. बऱ्याच वेळा आपले पण असेच होते. आपल्याला काय पाहिजे आहे किंवा आपल्याला काय सांगायचे आहे, हे समोरच्याला समजेल अशा भाषेत आपल्याला सांगता येत नाही. “नाही, मला असे म्हणायचे नव्हते”, “माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता”, अशी लांबण नंतर सुरु होते. त्यामुळे समज – गैरसमज, वाद – विवाद, भांडण – तंटे, यांचे पेव फुटते / ताण – तणाव वाढतात. अशा घटना घरी घडतात, बाहेर घडतात, ऑफिस मध्ये घडतात. आणि त्याचे परिणाम आपण बघतोच आणि अनुभवतो.

म्हणूनच गुरुजन सांगतात : Be specific, Be to the point, Be brief.

आता यापुढे भाजीवाल्याशी संवाद साधतांना, तिथला बोर्ड बघून मग ठरवायला पाहिजे कि आपण काय विचारायला पाहिजे हे लक्षात आले.

चार दिवसांनंतर (तेच ठिकाण, साधारण तीच वेळ) —-

सकाळी फिरायला गेलो, डेअरी मध्ये दूध घेतले. बाजूच्या भाजीच्या दुकानात बायको भाजी घ्यायला गेली. मी तिथेच उभा होतो. तेवढ्यात एक मॅडम दुकानात आल्या, ‘अरे टमाटे कसे आहेत’ ? बघितलं तर या मॅडम वेगळ्या होत्या. मला वाटलं, की मुलगा आता भाव लिहिलेल्या बोर्ड कडे बोट दाखवेल. पण दुकानदार मुलगा व मॅडम यांची पुढची डायलॉग बाजी साधारण परवा सारखीच झाली. मॅडम स्मित हास्य करत, टमाटे घेऊन बाहेर पडल्या.

बायकोची भाजी घेऊन झाली. पैसे देतांना मी मुलाला विचारले —

मी : दादा, एक विचारू का ?

मुलगा : काका जरूर विचारा 

मी : टमाटे कसे आहेत विचारल्यावर, तुम्ही रेट म्हणजे भाव सांगायला पाहिजे ना ! अशी लांबण का लावता. एखादा गिऱ्हाईक चिडेल ना !

मुलगा : काका, you are absolutely right

मुलगा : काका, आमचा धंदा एकदम रुक्ष आहे. भाव सांगायचा, भाजी द्यायची आणि पैसे घ्यायचे. थोडे गंमतीशीर बोलायला किंवा ऐकायला मिळाले, तर तेवढीच मजा येते. दिवस छान जातो. येणाऱ्या प्रत्येक गिऱ्हाईकाची बोलण्याची पद्धत वेगळी असते. गिऱ्हाईकाच्या चेहेऱ्याकडे बघून मला समजते, की फिरकी घ्यावी का ! किंवा नाही काही गिऱ्हाईक पण माझी फिरकी घेतात. मजा येते. दुकानात उभी असलेली मंडळी पण काही वेळा चर्चेत भाग घेते. लोकांच्या आणि माझ्या चेहेऱ्यावर हास्य येते.

मी : (मुलाचं इंग्रजी वाक्य आणि विचार ऐकून मी अवाकच झालो) बरोबर आहे. मला ऐकतांना मजाच आली.

मुलगा : काका ‘joy and happiness is to be spread. Is it not !’ पण त्याकरता मजा happiness generate व्हायला पाहिजे ना ! तुम्हाला मजा आली. तुम्ही चार लोकांना सांगणार, एखादा लिहिणारा असेल तर तो whats app वर टाकणार आणि ते ५० जण वाचणार. This is the chain of joy.

मुलानी टोपलीतलं एक सुंदर मोठं सफरचंद माझ्या हातात दिलं आणि म्हणाला —

मुलगा : This is for you. This is for spreading the taste. तुम्ही दुकानात नेहेमी भाजी घेता, पण फळे कधी घेत नाही. आता पुढच्या वेळेला भाजी पण घ्याल आणि फळे पण. This is called spreading of business.

मी : वाह, क्या बात है ! दादा, चहा घेणार का ? 

मुलांनी होकार दिला आणि मी बाजूच्या दुकानदाराला खूण करून ३ कटिंग चहा मागवले.

चहाचे घोट घेतांना मुलाला म्हटलं : This is for spreading togetherness.

मुलाला थँक्स म्हणून आणि बाय करून आम्ही हसत हसत बाहेर पडलो.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ३४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – ३४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

प्रश्न

। नृपस्य चित्तं कृपणस्य वित्तम्

 मनोरथा:  दुर्जनमानवानाम्

 त्रिया चरित्रं पुरुषस्य भाग्यम्

 देवो न जानति कुतो मनुष्य:।।

राजाचे मन, कंजुषाचे धन, दुर्जनाचे मनोरथ, स्त्रीचे चरित्र आणि पुरुषाचे भाग्य हे दैवाला सुद्धा जाणता आले नाही ते सामान्य मनुष्याला कसे काय उमगणार?

खरं आहे! एक सामान्य बुद्धीची व्यक्ती म्हणून मी जेव्हां जेव्हां रामायण, महाभारत आणि इतर अनेक ऐकलेल्या दंतकथांबद्दल विचार करते तेव्हा माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. तेव्हाही राहत होते आणि आजही तेच तेच प्रश्न मला पुन्हा पुन्हा पडतात.

अशा अनेक स्त्रिया ज्या मनावर स्वार आहेत..

आंधळ्या पतीसाठी आयुष्यभर डोळस असूनही डोळ्यावर पट्टी बांधून जगणारी गांधारी… हिला पतिव्रता म्हणायचं की जर ही धृतराष्ट्राचे डोळे बनून जगली असती तर वेगळे महाभारत घडू शकले असते का? पांडव आणि कौरवातले केवळ राज्यपदासाठीचे वैर मिटवता आले असतते का? कुरुक्षेत्रावरचं ते भयाण युद्ध टळलं असतं का?असा विचार करायचा?

कुंतीसारख्या महाराणीला जन्मभर दुर्वास ऋषीच्या क्रोधित शापवाणीमुळे लाभलेलं शापित मातृत्व का भोगावे लागले?

द्रौपदीने  पाच पांडवांचं पत्नीपद कसं निभवलं  असेल? नक्की कुणाशी ती मनोमन बांधली गेली होती? युधीष्ठीराबद्दल तिच्या मनात नक्कीच वैषम्य असणार आणि भीमाबद्दल आस्था. समान भावनेने पंचपतींचा तिने मनोमन स्विकार केला असेल का?

वृषालीने मनोमन कर्णावरच प्रेम केले. त्यावेळेच्या परिस्थितीनुसार कर्णाला दुसऱ्या स्त्रीशी विवाह करावा लागला तरीही वृषालीने पती म्हणून फक्त कर्णाचाच विचार मनात बाळगला.

अहिल्याचा कोणता दोष होता की, गौतमी ऋषीने केवळ त्यांच्या कुटीच्या वाटेवरून जाताना इंद्राला पाहिले आणि अहल्यावर व्यभिचाराचा आरोप ठेवून तिचे शापवाणीने पाषाणात रूपांतर केले आणि त्याच अहल्येचा कालांतराने रामाने उद्धार केला.

.. मीरा, राधा यांना आपण नक्की कोणत्या रूपात पाहतो? प्रेमिका की भक्तिणी की समर्पिता?

.. रामाबरोबर वनवासात गेलेल्या सीतेला एखाद्या सामान्य स्त्री सारखा कांचन मृगाचा लोभ का व्हावा?

.. रावणासारख्या असुराची  पत्नी मंदोदरीसाठी आपल्या मनात नक्कीच एक हळवा कोपरा आहे.

.. वालीची पत्नी तारा ही सुद्धा एक राजकारणी चतुर स्त्री म्हणूनच आपल्या मनात का राहते?

। अहल्या द्रौपदी तारा कुंती मंदोदरी 

पंचकन्या स्मरेत नित्यम | महापातक नाशनम्।।

…. हा श्लोक म्हणताना खरोखरच जाणवते की कोणत्याही कारणामुळे असेल, त्या त्या काळाच्या परिस्थितीमुळे असेल पण कुठला ना कुठला  कलंक चारित्र्यावर घेऊन जगणाऱ्या या स्त्रियांना काळानेच दैवत्व कसे दिले?

हे सगळे प्रश्न आजही अनुत्तरीतच आहेत. आणि म्हणूनच स्त्रीच्या चारित्र्याविषयी नेमकं काही ठरवताना जिथे देवही दुर्बल ठरले तिथे आपल्यासारख्यांचं काय?

पुरुषस्य भाग्यम्  हा सुद्धा असाच प्रश्न उभा करणारा  विषय आहे.

— रघुकुलोत्पन्न, सच्छील, मर्यादा पुरुष, एकपत्नीव्रती  पितृवचनी, बंधुप्रेमी, कर्तव्यपरायण रामाला  चौदा वर्षे वनवास का घडावा?

— राजा हरिश्चंद्रासारख्या सत्यप्रिय, वचनबद्ध, राज्यकर्त्याचे समस्त राज्य जाऊन त्याची दैना का व्हावी?

— भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्यांसारख्या महारथींना  दुर्योधनासारख्या अधर्मी व्यक्तीला कोणत्या लाचारीला बळी पडून साथ द्यावी लागली?

— युधिष्ठिराने  कौरवांसारख्या नीच वृत्तींबरोबर द्युताचा डाव मुळातच मांडलाच कशाला?

— आणि कौंतेय? सूर्यपुत्र, प्रचंड बलशाली, कवच कुंडल घेऊन जन्माला आलेल्या या कर्णाला सुतपुत्र म्हणून का जगावे लागले? परशुरामाचा शाप, इंद्राची चालाखी आणि अपात्र व्यक्तीशी मैत्रीच्या वचनात अडकलेल्या कर्णाचे भाग्य कसे भरकटत गेले हा केवळ जर— तरचाच प्रश्न उरतो.

— अर्जुनासारख्या धनुर्धराला  बृहन्नडा बनून स्रीवेषात वावरावे लागले.

— भीमाला गदेऐवजी हातात झारा घ्यावा लागला.. बल्लवाचार्याची भूमिका करावी लागली.

— कृष्णासारख्या युगंधराचाही शेवट मनाला थक्क करतोच ना?

— आणि वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी होतो हे सत्य केवळ कल्पनेच्या पलीकडचं नाही का?

अर्थात हे सर्व पुराणातलं आहे. पिढ्यानुपिढ्या ते आतापर्यंत आपल्याकडे जसंच्या तसं वाहत आलेलं आहे. पण या सर्व घटनांचा संदर्भ मानवाच्या सध्याच्या जीवनाशी आजही आहे. कुठे ना कुठे त्यांचे पडसाद आताच्या काळातही उमटलेले जाणवतात.

फूलन देवी पासून ते नरेंद्र मोदी इथपर्यंत ते उलगडता येतील.

जन्मतःच कुठलाही माणूस चांगला किंवा वाईट नसतोच. तो घडत जातो. एखाद्या व्यक्तीचे पूर्ण रूप जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा त्यामागे अनेक घटकांचा प्रभाव असतो. संस्कार, नितीअनितीच्या  ठोस आणि नंतर विस्कटत गेलेल्या कल्पना, भोवतालची परिस्थिती, त्यातून निर्माण झालेली अगतिकता, अपरिहार्यता किंवा ढळलेला जीवनपथ अशी अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे कुणाच्या चारित्र्याबद्दल अथवा भाग्याबद्दल जजमेंटल होणं हे नक्की चुकीचं ठरू शकत.

रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा एखादा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो किंवा केवळ गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेली एखादी स्त्री नव्याने शुचिर्भूत  होऊन पिडीतांसाठी देवासमान ठरू शकते.

कुणाचं भाग्य कसं घडतं याविषयी मला एक सहज वाचलेली कथा आठवली ती थोडक्यात सांगते.

— दोन भाऊ असतात. त्यांचे वडील दारुडे व्यसनी असतात. दोन्ही भावांवर झालेले कौटुंबिक संस्कार हे तसे हीनच असतात. कालांतराने वडील मरतात. दोघे भाऊ आपापले जीवन वेगवेगळ्या मार्गावर जगू लागतात. एक भाऊ अट्टल गुन्हेगार आणि बापासारखा व्यसनी बनतो. मात्र दुसरा भाऊ स्वतःच्या सुशील वागण्याने समाजात प्रतिष्ठा मिळवतो. हे कसे? त्यावर उत्तर देताना व्यसनी भाऊ म्हणतो, ” आयुष्यभर वडिलांना नशेतच पाहिलं त्याचाच हा परिणाम. ”

पण दुसरा भाऊ म्हणतो, ” वडिलांना आयुष्यभर नशेतच पाहिलं आणि तेव्हांच ठरवलं हे असं जीवन आपण जगायचं नाही. याच्या विरुद्ध मार्गावर जायचा प्रयत्न करायचा आणि ते जमलं ”

म्हणूनच भाग्य ठरवताना कुळ, गोत्र खानदान, संपत्ती, शिक्षण अगदी सुसंस्कार हे सारे घटक बेगडी आहेत. विचारधारा महत्त्वाची आणि त्यावरच चारित्र्य आणि भाग्य ठरलेले आहे. मात्र कुणी कसा विचार करावा हे ना कुणाच्या हातात ना कोणाच्या आवाक्यात. बुद्धिपलीकडच्याच या गोष्टी आहेत 

या श्लोकाचा उहापोह  करताना मी शेवटी इतकेच म्हणेन की,

* दैव जाणिले कुणी 

लवांकुशाचा हलवी पाळणा वनी वाल्मिकी मुनी…।।

— तेव्हा जजमेंटल  कधीच होऊ नका. काही निष्कर्ष काढण्याआधी  वेट अँड वॉच.

अहो जे देवालाही  समजले नाही ते तुम्हा आम्हाला कसे कळेल?

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares