मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मदतीचा त्रास ☆ डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले

? मनमंजुषेतून ?

☆ मदतीचा त्रास ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

विशु आमची जवळची मैत्रीण.

स्वभावाने लाख, हुशार आणि मदतीस अगदी तत्पर.

गम्मत अशी, की विशूचा मनुष्य संग्रह अत्यंत मोठा.

कोणतेही काम सांगा, हिच्याकडे,त्यावर माणसे,आणि उत्तर तयार असते.

बरं ,यात तिला मोठेपणाही नको असतो.

पण मदत करण्याची हौस— 

हसू येईल सांगितले तर,

पण हिच्या मदतीचा लोकांना त्रास होतो.

कसे म्हणताय?

ऐका तर।

लेकाचे लग्न विशूने हौसेने केले. 

सूनबाईना वेगळा फ्लॅट आधीच घेऊन ठेवला होता.

सूनबाई घरी प्रवेश करायच्या आधीच , विशूने, आपल्या हौसेने, घर अगदी मस्त लावून टाकले.

सूनबाईने बघितले, आणि म्हणाली, मला हा नको होता फ्रीज. आणि मला हा रंग नाही आवडत भिंतींना. मला तरी विचारायचे ना आधी.

झाले। एवढा खर्च, कष्ट करूनही  दोघीही नाराजच.

तरी विशूची जित्याची खोड जात नाही.

ती इतकी भाबडी आहे ना,की, समोरचा रागावूही शकत नाही.

सहज वीणा म्हणाली, बाई ग परवा केळवण करणार आहे, 10 माणसे यायची हेत. ,काही सुचत नाही बघ, काय मेनू करू,आणि कसे करू.

विशूने तिला न विचारता, तिच्या समोरच एका बाईना फोन केला, आणि मेनूही सांगून मोकळी झाली. 

वीणा म्हणाली, अग हे काय,। मी आहे ना इथे,मला विचार की. पैसे मी देणारे ना.

आणि तुला कुणी सांगितलं मला बाई हवीय ? मी बघीन काय करायचे ते–

ते विशूच्या गावीही नव्हते.. हल्ली लोक तिला बोलवेनासे झालेत.

आली की सर्व सूत्रे हाती घेतलीच म्हणून समजा.

भिडस्त लोकांना हे आवडत नाही पण बोलताही येत नाही.

 तिलाही फटके कमी नाही बसत,या स्वभावाचे.

कामवालीच्या उनाड मुलाला हिने नोकरी लावून दिली.

4 दिवसात मालकाचा हिलाच फोन। बाई कसला मुलगा दिलात–.गेला की काम सोडून।

विचारले कामवालीला, तर फणकाऱ्याने म्हणाली, “काय व बाई. असली नोकरी देतात व्हय?  दुधाच्या पिशव्या टाकायच्या- तर कोण  तिसऱ्या  तर कोण 5व्या मजल्यावर राहत्यात। पोराचे पाय दुखले,  दिली सोडून नोकरी “. 

विशू हतबुद्ध झाली, शेजारच्या मुलीचे लग्न जमता जमत नव्हते.

विशूच्या ओळखीचा एक मुलगा होता. हिने लगेच, त्या मुलीला, त्याचे स्थळ सुचवले.

दोघे, भेटले, बोलले.

ती मुलगी विशूला म्हणाली,  “काकू, कसला मुलगा, सुचवलात हो. सगळे एकत्रच राहतात. केवढी माणसे, घरात. आणि त्याला पगारही माझ्यापेक्षा कमी. नका बाई असले मुलगे सुचवू.”

बिचारी विशू.

तरीही, विशूची जित्याची खोड जाईना.–तिची मदतीची हौस भागेना,.–आणि मूळ स्वभाव बदलेना..

© डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चेक पोस्ट ड्युटी..शब्दांकन शीतल चव्हाण ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ चेक पोस्ट ड्युटी..शब्दांकन शीतल चव्हाण ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

(काळजाला हात घालणारा प्रसंग)

—-चेकपोस्ट अंकली…सोबत संजय जाधव सर… दुसऱ्या दिवशी पोलिसांनी काय मनावर घेतलं कुणास ठाऊक?..पण दुसऱ्या दिवशी सगळ्याच गाड्यांची झडती घेतली… पण तेवढ्यात सुध्दा लोकं डोळा चुकवून सटकत होती,…आणि जी अडवली जात होती त्यांच्या हातात हमखास दवाखान्याची फाईल…म्हणजे गेल्या 5 वर्षात जेवढी सांगलीला दवाखान्यात गेली नसतील ना.. तेवढी ह्या लॉकडाउनच्या काळात दवाखान्यात गेली….कुठून कुठून…,कधीच्या अन कुणाच्या फाईली हुडकून काढल्या कुणास ठाऊक?

ह्याच गडबडीत एक तरुण मुलगा येऊन माझ्यासमोर उभा राहिला….साधारण वीस बावीस वर्षाचा असेल…त्याला वाटलं आम्ही सुध्दा पोलिसच आहोत की काय !…म्हणाला “साहेब, बहिणीकडे चाललोय,पलूसला…प्लिज ..जाऊ दे.” जाधव सरांनी विचारलं.. ,”का चाललाय?”..त्यावर त्यानं जे उत्तर दिलं त्यावर आम्ही दोघेही खूप हसलो… म्हणाला, ” ते बहिणीला सांडगं, पापड, कुरुड्या आणि चटणी द्यायला चाललोय, उन्हाळ्याचं.”…मी हसत हसतच त्याला खुळ्यात काढलं,.. म्हटलं “लेका तुला काय कळतंय का?.. इथं काय चाललंय?..दुनिया थांबलीय अक्की..अन तुला कुरुड्याचं पडलंय होय!!”.. तसा त्याचा चेहराच पडला..”नाही साहेब, तसं नाही.. खरं प्लिज मला जाऊ दे”… मी त्याला पोलिसांकडे जायला सांगितलं.” जा..त्यांची घे जा परवानगी”. त्यानं पोलिसालापण हीच विनवणी केली… पोलिसांनी देखील सुरुवातीला त्याला शिव्याच घातल्या.. आणि परत जायला सांगितलं…तसा तो त्यातल्या एका पोलिसाच्या पायाशीच वाकला,..आणि ढसाढसा रडायला लागला….”साहेब प्लिज, मला जाऊदे, … नाहीतर माझ्या बहिणीचं काही खरं नाही… प्लिज मला माझ्या बहिणीसाठी तरी सोडा,….मी येताना परत इथं थांबतो,… त्यावेळी मला काय शिक्षा द्यायची ते द्या.”…. त्याच्या एवढ्या विनवणीवर आम्ही सगळेजण अवाक झालो…. त्या पोलिसाने त्याला जवळ घेऊन विचारलं…,”असं का म्हणतोयस”..त्यावर त्यानं रडतच उत्तर दिलं,…”साहेब ,दरवर्षी बहिणीला इकडूनच सगळं द्यावं लागतं,.नाहीतर सासरची लोकं तिला खूप त्रास देतात ओ….यावर्षी हे उन्हाळ्याचं द्यायला  जरा उशीर झालाय तर दाजी तिला रोज फोडून काढा लागल्यात.” …. भयाण वास्तव… तो भाऊ आमच्यासमोर मांडत होता…. एका पोलीस मित्रानं त्याला सांगितलं….”अरे एक तारखेनंतर जा की लेका”.… तो नाही म्हणाला,..” कारण आज जर इथून परत गेलो तर घरात आई बाच्या जीवाला पण घोर लागेल… गेली महिनाभर त्या दोघांना सुध्दा बहीणीची खूप काळजी लागलीय….”

एक निवृत्तीला झुकलेले पोलीस काका होते…. त्यांच्या डोळ्यांत मात्र टचकन पाणी आलं…. बहुधा त्यांनाही एखादी लेक असावी… कारण त्या पोलिसाच्या वेशात भावुक झालेला बाप मला स्पष्ट दिसत होता…. सगळे पोलीस बंधू भगिनी, आम्ही क्षणभर शांत झालो होतो…. एरव्ही निर्ढावलेल्या चेहऱ्याच्या सर्व पोलिसांच्या डोळ्यांत पाणी साचलं होतं.… अन माझ्या साठलं होतं…. त्या पोलीस काकांनी त्याला स्वतःच्या गाडीवर बसवलं.. आणि म्हणाले..”चल, माझ्याबरोबर.. आपण दोघे मिळून तुझ्या बहिणीला हे सगळं देऊन येऊ.”….परत त्याला भीती.. पोलिसाला बघितल्यावर सासरची खवळतील अन परत बहिणीबाबत काही विपरीत घडायला नको…. म्हणून त्याने परत हात जोडून एकट्यालाच जाऊ द्यायची विनवणी केली….त्या पोलीस काकांनी त्याला धीर दिला.. “अरे मी समोर येणार नाही.. तू बाहेरच्या बाहेर दे आणि ये.. मी थांबतो अलीकडच्या चौकात.”..…एवढं ऐकल्यावर त्या मुलाने पोलीस काकांना घट्ट मिठीच मारली अन ओक्साबोक्शी रडू लागला……पोलीस काकांनी त्याला धीर देत गाडीवर पाठीमागे बसवलं.. त्या पिशव्या ,डबा ,,बरणी घेऊन तो पोलिसाच्या गाडीवर बसला आणि गाडी स्टार्ट झाली.. नजरेआड होईपर्यंत मी आणि जाधव सर त्या गाडीकडे पाहत होतो.. अगदी भरल्या डोळ्याने… पोलीस वेशातील एक बाप चालला होता.. ..एका लेकीकडे…..आणि एक भाऊ चालला होता एका बहिणीकडे…..फक्त नी फक्त तिचे अश्रू पुसण्यासाठी……

आज परत माझ्या मनात असंख्य प्रश्न काहूर माजवून गेले…..त्रास देवून गेले… ..तरीही आजूबाजूला अशी परमेश्वराची रूपं पाहायला मिळाली अन मी भानावर आलो….. आज परत मला कळेना कुणाला परमेश्वर म्हणू?….त्या भावाला?….त्या बहिणीला?….की त्या पोलीस काकांना?…..पण  तो आहे एवढं मात्र नक्की.. कोणत्या ना कोणत्या रुपात तो तुम्हाला भेटावयास येतो… कदाचित आज देखील …

खरं सांगू… परमेश्वराने आपल्याला ” माणूस ” या पदावर पोस्टिंग केलंय.. पण आपण आपली पोस्ट विसरत चाललोय ….तसं विसरून नाही जमणार…. ती सतत चेक करावी लागेल आपल्याला…आपली माणूस ही पोस्ट… कदाचित ह्यालाच चेकपोस्ट म्हणतात बहुतेक…. . आज खऱ्या अर्थाने मी चेकपोस्टवर ड्युटीला होतो….. 

 थेट चेकपोस्टवरून…  

शब्दांकन… शीतल चव्हाण, जयसिंगपूर 

संग्राहक – श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आमच्या आठवणीतील पहिला स्वातंत्र्यदिन – भाग दुसरा ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? मनमंजुषेतून ? 

☆ आमच्या आठवणीतील पहिला स्वातंत्र्यदिन – भाग दुसरा ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆  

आम्ही रहात होतो तेथेही स्वातंत्र्य चळवळीने भारावलेले काही तरुण तरुणी रहात होते. जवळच सेवादलाची शाखा होती. सर्व लहान मुलांना तेथे गोळा करून गाणी गोष्टी सांगितल्या जात. साने गुरुजींची, त्यांच्या विचारांची ही सेवादल शाखा होती. अनेक मैदानी खेळ इथे खेळायला मिळत. झेंडावंदन, देशभक्तीची गाणी शिकवली जात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सेवादलाच्या शाखा हळूहळू बंद पडल्या. पण साने गुरुजींच्या विचाराप्रमाणे, ध्येयाप्रमाणे कार्य मात्र सुरू राहिले.

माझ्या लग्नानंतर एकदा घराच्या माळ्यावर सूतकताईचा चरखा दिसला. मी चौकशी केली तेव्हा समजले, तो माझ्या मिस्टरांचा, ‘माधव नारायण कुलकर्णी’ यांचा होता. ते सेवादलाचे कार्यकर्ते होते. साने गुरुजींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी कोल्हापुरात राष्ट्रसेवादलाचे शाखा प्रमुख म्हणून उल्लेखनीय काम केले होते. पहिल्या स्वातंत्र्य दिनाची ते एक आठवण सांगत. ध्वजारोहण कसे करावे, वंदेमातरम म्हणायला शिकवणे, तिरंगा हवेत लहरत ठेवण्याचे नियम शिकवणे वगैरे गोष्टींची माहिती लोकांना देण्याकरिता हे सेवादलाचे कार्यकर्ते गावागावातून जात. त्यात श्री. राम मुंगळे, श्री. बाबासाहेब बागवान, श्री.यमकनमर्ढे वगैरे मित्र असत. सेवादलाची गाणीही गायला शिकवले जाई. नंतरही बरीच वर्षे हे सर्व मित्र (‘ह्यांच्या सांगण्याप्रमाणे जवळजवळ पन्नास वर्षे) महिन्यातून एकदा एकत्र येत. स्थळ होतं, श्री. मोहनराव लाटकर यांचे ‘ओपल हॉटेल!’ त्यात श्री. चंद्रकांत पाटगावकर, बाबुराव मुळीक,इ. होते. हे सर्व श्री. एस्. एम्. जोशी, श्री. नानासाहेब गोरे, श्री. यदुनाथ थत्ते, श्री. आजगावकर आणि साधना परिवाराशी जोडलेले होते. देशभक्तीने भारावलेले हे प्रामाणिक कार्यकर्ते! बरेचसे प्रसिध्दी पराङमुख!! बाबुराव यमकनमर्ढे यांनी तर त्या काळात कोकणात जाऊन शाळा सुरु केली.

बालवयात ऐकले होते, स्वातंत्र्य मिळाले, चांगले दिवस येतील. लहानपणी काही दिवस रेशनवर धान्य मिळे. मिलो (तांबडा जोंधळा)मका, बटाट्याचे चौकोनी तुकडे… कापड सुध्दा रेशनवर मिळे. चीटाचे  कापड म्हणत. . याचेच कपडे शिवले जात. फ्रॉक, परकर-पोलकी, गल्लीतल्या सर्व मुलींची सारखी! आम्हाला गंमत वाटे!! गोर गरीब, सामान्य, श्रीमंत, सुस्थितीतील लोकांनाही तेच कपडे घालावे लागत. त्यावेळी साथीचे रोग होते. प्लेग, कॉलरा, टी. बी., देवी, इ. पालक चिंतेत असत. दंगलीही होत. सामाजिक वातावरण काहीसं असुरक्षित वाटे. तरीही शेजारी एकमेकांना मदत करत. लपंडाव, सागरगोटे, आंधळी कोशिंबीर असे अनेक देशी खेळ खेळण्यात मुलांना आनंद मिळे. वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके यांच्या वाचनाने विचार आणि जीवन समृद्ध होत असे.

आज विचार केला तर? अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वावलंबी झालो आहोत. तरी शेतकरी काळजी मुक्त नाही. कपडे, फळे, धान्य मुबलक आहे. अद्ययावत साधने, विज्ञान-तंत्रज्ञान यामुळे  सुधारणा झालेली आहे. परंतु संकटांचा ससेमिरा तसाच आहे. कोरोनाची महामारी, महापूरासारखी आस्मानी संकटे त्यात भर घालत आहेत. कोविड जीवाणूंचे नवीन प्रकार पाय पसरत आहेत. शासन व्यवस्था करत आहे. पण गरज आहे मनोबलाची, स्वच्छतेची, शिस्तीची! गरज आहे विश्वासाने एकमेकांना समजून देण्याची!! लहानथोरांना आधार देण्याची!! स्वतंत्र भारताची, स्वातंत्र्य देवीची ही मागणी, ही इच्छा आपण सर्वांनी मिळून एकजूटीने, निष्ठेने पूर्ण करायची आहे.

वंदेमातरम !!

© सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

फोन नंबर : 0738768883

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ क्रांतिकारकांचे आईस (भारतमातेस) पत्र ☆ श्री विजय गावडे

? मनमंजुषेतून ? 

☆ क्रांतिकारकांचे आईस (भारतमातेस) पत्र ☆ श्री विजय गावडे ☆  

प्रिय भारत मातेस
कृ. सा. न. वि. वि.

आई तूझी आठवण येते. आई तुझी खूप खूप आठवण येते.

काळ कसा भरभर पुढे सरकला, कळलंच नाही बघ. हा हा म्हणता तू स्वतंत्र होऊन पंच्यात्तर वर्षें उलटली सुद्धा.  तुझ्यावर जीव ओवाळून टाकतानाचा तो क्षण आठवला तरी नसलेल्या शरीरावर आजही रोमांच उभे राहतात.

सिंहावलोकन करतांना कधी कधी आई असं वाटतं की स्वातंत्र्य लढ्यात आम्ही दिलेली आमच्या प्राणांची आहुती, हि चूक तर नव्हती ना आमच्या हातुन घडलेली.

आम्ही तर जागेपणी हि तुझ्या अखंड अस्तित्वाची स्वप्ने पाहिलेली.  आसेतू हिमालय असलेली तुझी अखंड मूर्ती आम्ही आमच्या हृदयात साठविलेली. मात्र स्वातंत्र्य  मिळताच जे घडलं ते अत्यन्त क्लेशकारक होतं. आमच्या मातृभूचे तुकडे झालेले पाहून आमचा भ्रमनिरास झालेला. तुच्छ राजकीय अभिलाषा तुला एवढं दुःख आणि वेदना देईल यावर विश्वासच नव्हता बसत.

असो. जे झालं ते झालं. तुझ्यावर राज्य करणारे आमचे बांधव तुझा आत्मसन्मान तुला पुनः मिळवून देतील अशी आशा आहे.
तेवढं सर्व राजा रजवाड्यांच्या रियसतींचं तुझ्यात झालेलं विलीनकरण सोडलं तर काहीच आमच्या मनासारखं होत नव्हतं. कित्येक वेळा तर परकीयांच्या जागी आता आपल्याच लोकांशी संघर्ष करावा लागणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली पाहून आमचे सर्वांचे आत्मे तडफडत होते.

पण ईश्वरेच्छा बलियसी या न्यायाने तुझ्या उज्वल भवितव्याकडे सुरु असलेल्या वाटचालीकडे आमचे डोळे लागून राहिले आहेत. तुझी उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि तुला विश्वगुरूचा मान मिळो हिच आम्हा सर्वांची मनोमन प्रार्थना.  येवू घातलेल्या पंच्यात्तरि पुढे शम्भर, सव्वाशे, दीडशे……… हजार……..अशी अनन्त काळ पर्यंत तुझी स्वतंत्रज्योत तेवत राहो हिच तुझ्या सर्व लेकरांची शुभेच्छा!

तुझेच लाडके सुपुत्र क्रांतिकारी
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, वासुदेव बळवन्त फडके…………….. ई.

© श्री विजय गावडे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आमच्या आठवणीतील पहिला स्वातंत्र्यदिन – भाग पहिला ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? मनमंजुषेतून ? 

☆ आमच्या आठवणीतील पहिला स्वातंत्र्यदिन – भाग पहिला ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆  

पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस! आपल्या देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन!! त्यावेळी आम्ही पाचवी- सहावीत शिकत असू. शहरात सगळीकडे उत्साही वातावरण होते.. तसेच शाळेतही होते. एखाद्या सणाप्रमाणे आम्ही चांगले कपडे घालून, नटूनथटून शाळेत गेलो होतो. त्यावेळी शाळेचा विशिष्ट असा युनिफॉर्म नव्हता. शाळा रंगीबेरंगी पताका लावून सजवली होती. पंटागणात रांगोळी काढली होती. कोणी मोठे पाहुणे येणार असावेत! वातावरण स्वच्छ, सुंदर, आनंदी होते. मैदानावर रांगेत आम्ही सर्व मुले-मुली ऊभे होतो. शाळा सुरु होण्यापूर्वी रोज प्रार्थना असे. त्यादिवशी स्वतंत्र भारताचा

‘तिरंगा’ उंच फडकाविला गेला. ‘ वंदे मातरम’ गायले गेले, ‘राष्ट्रगीत’ झाले. ‘भारत माता की जय’ घोषणा दिली गेली. आम्ही सर्व मुले खूप जोरात मोठ्या अभिमानाने ‘जय’ म्हणत असू. आम्हाला सर्वांना गोड खाऊ वाटला गेला. आम्ही मुले स्वतंत्र भारताचे उद्याचे भविष्य आहे, असे काहीसे पाहुण्यांचे भाषण झाले. त्यांनी खूप काही सांगितले. ते म. गांधी, पं. नेहरु, सुभाषचंद्र बोस अशा अनेक थोर नेत्यांबद्दल बोलले. आम्हाला ‘देश स्वतंत्र झाला’; एवढे फक्त कळले. आता भारत देशाला, आपल्याला चांगले दिवस येणार. तो खूप आनंदी दिवस होता.

आमच्या घरात भिंतीवर एक फोटो फ्रेम होती. सुंदर रंगीत चित्र! भारताच्या नकाशाचे!! एका बाजूला गांधी, नेहरु, सुभाषचंद्र असे बऱ्याच पुढाऱ्यांचे चेहरे. दुसऱ्या बाजूला भारतातून ब्रिटिश शिपाई बाहेर पडत आहेत असे दाखवले होते. तसेच भारतीय लोकांची खूप मोठी रांग, जी संपूर्ण नकाशावर होती. प्रत्येकाच्या हातात तिरंगा ध्वज! हे चित्र मनावर कोरले गेले. खाली लिहिले होते. . . ” छोडो भारत”, “Quit India”. त्यावेळी त्या चित्राचा अर्थ फारसा लक्षात येत नसे. पुढे शाळेत इतिहासाच्या अभ्यासात; तसेच गोष्टी वाचनातून समजत गेले, तसे सर्व गोष्टींचे महत्त्व कळत गेले.

शालेय जीवनात  माझ्या हातात एक पुस्तक आले. माझा चुलतभाऊ नाना ( चंद्रकांत ) याने ते मला भेट म्हणून दिले. मुखपृष्ठावर कॅप्टन लक्ष्मीचे लष्करी पोषाखातील आकर्षक रंगीत चित्र, बाजूला लष्करी पोषाखातील महिला. नाना आम्हां भावंडांपेक्षा वयाने बरेच मोठे होते. माझ्या आठवणीप्रमाणे ते ब्रिटिश काळात जेलर म्हणून नोकरीस होते. देशभक्त कैदी लोकांचे हाल त्यांना सहन होत नसत. म्हणून त्यांनी ती नोकरी सोडली होती. आमच्या बालमनावर नकळत संस्कार होत गेले. आम्ही बघत होतो, ऐकत होतो, घडत होतो.

आम्ही असे मोठे होत गेलो. वाचन वाढले. संदर्भ लक्षात यायला लागले. ऑगस्ट महिन्यात अनेक सण येतात.पारंपारिक सणांशिवाय सर्व भारतीयांचे आनंदाचे सण, अभिमानाचे दिवस म्हणजे नऊ ऑगस्ट क्रांतीदिन आणि पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिन!

देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसची चळवळ हे जनतेने केलेले तीव्र आंदोलन होते. इ. स. २०२१ साली या चळवळीला  एकोणऐंशी वर्षे, २०२२ साली ऐंशी वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबईत ज्या मैदानात या आंदोलनाला सुरुवात झाली त्या मैदानाला ‘ऑगस्ट क्रांतीदिन मैदान’ म्हणून ओळखले जाऊ लागले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी राष्ट्रपिता म. गांधीजींनी ‘भारत छोडो’ हा अंतिम इशारा दिला. संपूर्ण देशातील अनेक लोक तरुण पिढी या आंदोलनात सहभागी झाली होती. प्रत्येक व्यक्ती जणू नेता बनली होती. ब्रिटिश सरकारने एक दिवस आधीच म. गांधी आणि प्रमुख पुढाऱ्यांना कैद करुन बंदी केले होते. ८ ऑगस्ट १९४२ या दिवशी अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या सभेत ह्या आंदोलनाचा निर्णय झाला होता. अरुणा असफअली ही शूर धाडसी तरुणी पकडली गेली नाही. ९  ऑगस्ट १९४२ या दिवशी मुंबईच्या ‘ गवालिया टॅंक मैदानात’ ‘तिरंगा ध्वज’ फडकविला गेला आणि ‘भारत छोडो’ आंदोलनाला सुरुवात झाली.

क्रमशः…………

© सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

फोन नंबर : 0738768883

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ म्हातारी ☆ श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ म्हातारी ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

लहान मुलांना आपण शेकडो गोष्टी सांगतो. साधारणपणे तिसऱ्या वर्षापासून सात-आठ वर्षांची होईपर्यंत सगळी मुलं गोष्टींमध्ये मनांपासून रमतात. या गोष्टींमधून मुलांचं स्वतःचं एक भावनिक, आभासी विश्व तयार होत असतं. त्यात राजा असतो, राणी असते, राजकन्या असते, म्हातारी असते, लबाड कोल्हा असतो आणि एक भला मोठा भोपळा सुद्धा असतो. ही सर्व मंडळी मुलांच्या लेखी खरोखरच अस्तित्वात असतात!आजी-आजोबा हा गोष्टी मिळवण्याचा मुख्य स्रोत! त्यानंतर रात्री गोष्टी ऐकत ऐकत झोपण्यासाठी आई लागते. बाबा लागतात.

या गोष्टीतल्या पात्रांमधल्या “म्हातारी” या पात्राबद्दल मला विलक्षण कुतूहल आहे! वेगवेगळ्या गोष्टींतून ही म्हातारी येते. गोष्टी निरनिराळ्या असल्या, तरी मला म्हातारी नेहमी एकाच रूपातली दिसते. पांढरे शुभ्र केस, तोंडाचं बोळकं, बारिकशी कुडी, कमरेत वाकलेली, हातातली काठी टेकत टेकत तुरुतुरु चालणारी! डोक्यानं तल्लख! “एक होती म्हातारी” हे वाक्य ऐकलं की माझ्या डोळ्यासमोर म्हातारीचं हेच चित्र उभं रहातं. म्हातारी आणि भोपळा यांचं नातं अतूट आहे. कुठल्याही मराठी माणसानं म्हातारीची ही विलक्षण कथा ऐकलेली नसेल, हे तर संभवतच नाही! पूर्वी कितीही वेळा ऐकलेली असली, तरी मुलं ही माहीत असलेली गोष्टच पुन्हा पुन्हा सांगायला लावतात! ती म्हातारी, तिची लेक, वाघोबा-कोल्होबा, शिरा-पुरी, तूप-साखर, लठ्ठलठ्ठ होण्याचं खोटं आश्वासन, भला मोठा भोपळा, आणि “म्हातारी बितारी मला नाही ठाऊक –  चल रे भोपळ्या टुण्णुक टुण्णुक” असं म्हणत वाघोबा-कोल्होबाचा पार मामा करून टाकणं — हे सगळं ऐकतांना गुदगुल्या झाल्यासारखी खिदळणारी पोरं पाहायला मला आवडतात!! या गोष्टीचा शेवट दोन प्रकारांनी सांगितला जातो. पहिल्या प्रकारात वाघोबा-कोल्होबाच्या हातावर तुरी देऊन भोपळा म्हातारीला सुखरूप घरी आणून पोचवतो, असा शेवट केला आहे. दुसऱ्या प्रकारात, म्हातारी राखेच्या ढिगाऱ्यावर झोपते, मग वाघ तिला खायला येतो, आणि मग म्हातारी जोरात *???? फुस्स्स्स्!! राख उडते आणि वाघाच्या डोळ्यांत जाते. डोळ्यात राख गेल्यामुळे वाघ डोळे चोळत बसतो आणि भोपळा म्हातारीला सुखरूप घरी आणतो, असा शेवट केला आहे. मला दुसरा प्रकार ऐकायला खूप आवडायचा! आणि इतर बच्चे कंपनीला सुद्धा! पण एकूणच या म्हातारीने बालवाङ्मयात अढळपद मिळवलं!!!

म्हातारीची इतर रूप पाहतांना देखिल मला मजा वाटते. सांवरीच्या झाडाची, चवरीच्या आकाराची, पांढऱ्या तंतुंची, बुडाला हलकसं बियाणं चिकटलेली, हवेवर तरंगत तरंगत जाणारी म्हातारी पाहायला मला आवडते! सावरीची म्हणजेच शेवरीची शेंग तडकली, की अशा शेकडो म्हाताऱ्या एकदम हवेवर तरंगायला लागतात. त्यांच्या हातात हात घालून मला पण तरंगल्याचा भास होतो! (शेवरीची म्हातारी म्हटल्यावर आचार्य अत्रे यांची आठवण येणे अपरिहार्य आहे!)

सुकं खोबरं किसतांना शेवटी किसला न जाणारा असा चिवट पापुद्रा शिल्लक राहतो. त्याला म्हातारी हे नांव कां पडलं असावं, हे मला एक कोडं आहे. बहुधा मरू घातलेल्या, पण चिवटपणे जिवंत राहून आप्तेष्टांच्या पदरी गाढ निराशा टाकणाऱ्या म्हातारीचा ‘चिवटपणा’ हा गुण या पापुद्र्याला चिकटला असावा आणि हे नामाभिधान त्याला प्राप्त झालं असावं!

साखरेच्या गुलाबी रंगाच्या तंतुंच्या काडीभोवती गुंडाळलेल्या कापसाच्या गठ्ठ्याला म्हातारीचे केस असं कां म्हणतात, हे सुद्धा मला एक कोडंच आहे. आजकाल बऱ्याच खऱ्याखुऱ्या म्हाताऱ्या, मेंदी लावून आपले केस लाल-भगवे करून घेतात. खरं म्हणजे त्यांना म्हातारपणांत सुद्धा गुलाबी रंगाचं वावडं नसावं! म्हातारीचे गुलाबी साखरेचे केस विकणारे, हातात एक हळुवारपणे किणकिणणारी घंटा घेऊन केस विकायला येतात. त्यांच्याकडे गुलाबी रंग मिळू शकेल हे या खऱ्या म्हातार्‍यांना कुणीतरी सांगायला हवं! कदाचित तो म्हातारीचे केस विकणारा, खऱ्या म्हाताऱ्यांच्या खऱ्या केसांना सुद्धा गुलाबी रंग लावून देईल!

पावसाळ्यात गडगडाट झाला, की आकाशातली पीठ दळणारी म्हातारी केवढी असेल, तिचं ते धान्य दळायचं जातं केवढं मोठं असेल, असं कुतुहल लहानपणी वाटायचं! आकाशातून सरसरत खाली पडणाऱ्या पिठाचा पाऊस कसा होतो, हा प्रश्न तर अजूनही अनुत्तरीतच आहे. पण त्या लहान वयात सगळं खरं खरं वाटायचं!!

म्हातारीच्या टोपलीतली बोरं चोरणाऱ्या कोल्होबाची गोष्ट तर आबालवृद्धांना अतिशय प्रिय! या कोल्होबाला अद्दल घडवायला म्हातारी होते  सज्ज! हुशारच ती!! सणसणीत तापवून, लालबुंद केलेला तवा ती टोपली जवळ ठेवते. आपल्याला बसायला म्हातारीने रंगीत पाट ठेवलाय्, म्हणून कोल्होबा खुश्. ते त्या रसरशीत तव्यावर जरा बुड टेकून बसतात मात्र … आणि??? आणि हाहा:कार!!! कोल्होबा जीव घेऊन पळ काढतात. म्हातारीची हसून हसून पुरेवाट होते. जळके कुल्ले सांभाळत पळणाऱ्या कोल्होबाला म्हातारी खिजवून प्रश्न विचारते …

शहरी भाषेत

कोल्होबा कोल्होबा बोरं कशी लागली?

नको नको म्हाताऱ्ये, खोड मोडली!!

ग्रामीण भाषेत

कोल्होबा कोल्होबा बोरं कशी लागली?

नको नको म्हाताऱ्ये, * भाजली !!

तर अशी ही म्हातारी! लहान मुलांच्या गोष्टींतून, लोकवाङ्मयातून दिसणारी. ती डोक्याने तल्लख आहे, चटपटीत आहे, युक्तीबाज आहे, विनोदी आहे! ती लहान मुलांच्यात रमते आणि मुलं तिच्यात रमतात. मुलांच्या भावविश्वात तिचं स्थान अढळ आहे आणि म्हणूनच …

ही म्हातारी अमर आहे!

?  ?

© श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ व्यक्तिचित्रण- बाई रामचंद्र सिंदकर ☆ डॉ दिपाली घाडगे

? मनमंजुषेतून ?

☆ बाई रामचंद्र सिंदकर ☆ डॉ दिपाली घाडगे ☆ 

व्यक्तिचित्रण – बाई रामचंद्र सिंदकर

जन्म-१९३२.        

वय वर्ष -८७

बाई म्हणजे माझ्या सासूबाई, दहाबारा दिवसांपूर्वी त्यांचे देहावसन झाले.मला अखंड कुतूहल वाटायचे त्यांच्या नावाबद्दल, व्यक्तिमत्वा बद्दल आणि एवढ्या दीर्घायुष्याबद्दल.

इथे माझ्या सासऱ्यांचा उल्लेख केलाच पाहिजे ‘ कै नारायण घाडगे ‘ सहा फुटांपेक्षा जास्त उंची, गौर वर्ण आणि चेहऱ्यावर कायम एक प्रसन्न,समंजस हास्य,कुठल्याही मदतीला सदैव तत्पर व्यक्तिमत्व. मी सुरुवातीला त्यांना पाहिलं ते लाल रंगाचा स्वेटर घालून घराजवळच्या बागेत बंबासाठी लाकडे फोडताना. त्या

पोशाखात त्यांचे व्यक्तिमत्व अगदी एखाद्या इंग्रजी पिक्चर मधील कलाकारासारखे दिसत होते.

याच्या अगदी विरुध्द बाईंचे व्यक्तित्व. ठेंगणाठुसका बांधा, सावळा नाहीच काळ्याकडे झुकणारा वर्ण आणि नाकीडोळी मात्र ठसठशीतपणा,कपाळावर मोठे कुंकु आणि चेहऱ्यावर आत्म प्रौढी मिरवणारे दिमाखदार हास्य.त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांचा स्वभाव प्रतीत व्हायचा.अखंड स्वत:च्या तालात असणारे व्यक्तित्व.जणू तो अहंकार त्यांच्या

शरीरालाच चिकटलेला होता आणि तो शेवटपर्यंत तसाच राहिला.

त्याच्याकडे प्रचंड बुध्दीमत्ता होती, नेतृत्वगुण होते शिवाय ज्ञानप्राप्तीची आवड होती,त्यामुळे सतत सल्ला विचारण्यासाठी माणसे येत असत.कधीही फक्त स्वतः च्या कुटुंबाचा विचार करायचा नाही, आपल्या मुलांबरीबरचं त्यांच्या मित्रांनाही खाऊपिऊ घालायाचे.त्या काळी एस टी मध्ये काम करणाऱ्या माणसाचे उत्पन्न ते किती असायचे,पण त्यातूनही सतत परोपकार करत राहायचे.आपली पाच मुलं जशी तशी ती सुध्दा आपलीच मुलं मानायच्या आणि त्यांना शिकण्या साठी सक्रिय प्रोत्साहन द्यायच्या.

त्याची पाचही मुले उच्च शिक्षित आणि आपापल्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणारी.त्या  स्वतः साठ वर्षांपूर्वीच्या म्याट्रिक आणि माझे सासरे संस्कृत मध्ये एम ए होते.(कै नारायण घाडगे विट्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शाखेतील सुरुवातीच्या शिक्षकांपैकी एक होते) त्यामुळे दोघांनाही शिक्षणाविषयी आस्था होती.त्याची मुले माझे मोठे दिर श्री अविनाश घाडगे मुख्याध्यापक म्हणुन निवृत्त झाले, श्री दिनेश घाडगे विट्यातील शिवसेनेचे संस्थापक, श्री सुरेश घाडगे सोलापूर ट्रेनिंग सेंटर येथे DYSP म्हणुन कार्यरत, कै अधिवक्ता सतीश घाडगे प्रथितयश वकील, ग्राहक पंचायतचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे तालुक प्रमुख होते आणि कै राजेश घाडगे यशस्वी वेट लिफ्टर होते.

या सर्वांबरोबर श्री लालासाहेब पवार आणि श्री अरुण फडतरे हे त्यांचे मानसपुत्र देखिल उच्चशिक्षित झाले. पवार सरांनी शेवटपर्यंत त्यांची सेवा केली, त्यांचा कोणताही शब्द डावलला नाही.

बाईंचे माहेर वाई. अागदी नदीकाठालगत ब्राम्हणपुरी मध्ये. त्यामुळे शुद्ध सडेतोड भाषा, ओचा पदर खोचलेली नऊवार साडी आणि आंबाड्यावर खोचलेले एखादे फूल नेहमीच त्यांना शोभून दिसत असे. त्यांचे माहेर देखिल सुशिक्षितच. वडिल शिक्षक होते आणि भाऊ मामलेदार, आई मात्र लहानपणीच वारलेली मग कर्तेपणाने लहान बहिणींची लग्ने बाई भावजींनीच करुन दिली. त्यामुळे सारेच सासऱ्यांना भावोजी म्हणू लागले.

बाई आपल्या वडिलांकडून काही औषध देण्यास शिकल्या होत्या. त्यामुळे काविळीचे  औषध घेण्यासाठी त्यांच्याकडे बरेच लोक येत. त्या देखिल सकाळी सकाळी ओचा पदर खोचून, आजूबाजूला फिरून काही वनस्पती गोळा करत आणि त्या वाटून रस काढून पिण्यास देत, वरुन काही पथ्य सांगत.त्यामुळे मी डॉक्टर असले तरी सुरुवातीला आमच्याकडे येणारे रुग्ण बाईंकडून औषध घेण्यासाठी येत.

अशी ही कृष्णा काठची लेक घाडगेवाडी सारख्या दुष्काळी गावात आली आणि त्या गावची होतकरू व्यक्ती झाली.

तिथली खडकाळ शेती विट्यातील मैत्रिणींना बरोबर घेऊन केली.

या कृष्णा काठच्यां लेकीचे सासरीही तसेच लाड झाले, शिकलेली ज्ञानी म्हणुन. अगदी तिच्या थोरल्या जावेणे, म्हाताऱ्याआईने, इंदुला सिनेमा बघायला आवडते म्हणुन

आपल्या दिराला बैलगाडी जुंपायला सांगावे आणि ती परत येईपर्यंत भाकरी कालवण करुन ठेवावे.

पोथ्या, पुराणे, पचांग जाणत असल्या तरी बाई विचाराने पुरोगामी होत्या. रोजचे वर्तमान पत्र वाचणे आणि टीव्ही वरच्या बातम्या पाहणे हे त्यांचे शेवटच्या पाचसहा वर्षां पूर्वीपर्यंत चे छंद होते. आपल्या मुला, नातवंडांनी आपल्या मर्जीने केलेली लग्न त्यांनी स्वीकारली होती.

आम्हा सुनांच्या बाबतीत सांगायचं झालं तर स्वभावानुसार फार लावून घेतले नाही, पण आमच्या शिक्षणाला व्यक्तिमत्व विकासाला कधी बाधा आणली नाही. माझ्या मोठ्या जाऊबाईंच BA Bed, नंतरच्या BSc,नंतर MSc Bed   आणि माझे BAMS  या साऱ्या पदव्या लग्नानंतर घेतल्या गेल्या आहेत आणि आम्ही साऱ्याजणी स्वतः चा पायावर उभ्या आहोत, यातच सारे काही आले.

बाईंच्या नातसूनांनीही ही परंपरा पुढे चालवली. सौ कविता MA Bed, सौ  अमृता Phd,. सौ अनुजा ME, त्याचबरोबर त्यांची सारी नातवंडेही उच्च शिक्षित असून विविध ठिकाणी कार्यरत आहेत.

त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक नातावंडाला दिलेले वेगवेगळे नाव बाळक्या,गुंड्या,पप्या ही त्यापैकी काही. सगळ्यात लहान नात म्हणजे माझी मुलगी.तिला त्या नेहमी आवडे या नावानेच हाक मारत. असा बाईंच्या वारसांचा वटवृक्ष विस्तारला आहे. एक सुफळ संपुर्ण आयुष्य त्यांना लाभले.

सारं आयुष्य भरल्या घरात, खूप माणसं अवतीभोवती असं गेलं त्यामुळे थोडथोडक काही करायचं माहीतच नाही, जे केलं जायचं ते अगदी डबे भरभरून असायचं.भाकरी चपाती बरोबर पुरणाची पोळीही पोळपाट भरुन लाटली जायची, त्यामुळे आयुष्याच्या शेवटी जेव्हा नवरा, आणि दोन तरुण मुलं यांचं जाणं बघावं लागलं, घरातली माणसं कमी झाली तसा स्वभाव अधिक दुराग्रही झाला. तरी त्यांची जीवनेच्छा जबरदस्त होती आणि त्यांच्याजवळ वर्तमान काळात जगण्याची हातोटी होती.

बरीच वर्षे मला कोडे पडले होते त्यांना बाई का म्हणत असावेत आणि विशेष म्हणजे त्यांना बाई म्हटलेले आवडायचे, आपल्या परतवंडांना ही त्या स्वतः ला बाई म्हणायला शिकवत, तसे त्यांचे नाव इंदिरा ठेवले होते.

नंतर मी कोठेतरी वाचले की महाराष्ट्राच्या काही भागात पूर्वी घरातली मोठ्या मुलीला बाई म्हणायची पद्धत होती, जसं ताई, अक्का तसं बाई. म्हणजे बाई हे त्यांचे माहेरचे नाव होते आणि म्हणुनच त्यांना बाई म्हटलेले आवडायचे.

© डॉ दिपाली घाडगे

विटा

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पाऊलखुणा – २ ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? मनमंजुषेतून ?

☆ पाऊलखुणा – २ ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆ 

(या लेखमालेचा पहिला भाग अनावधानाने “आत्मसाक्षात्कार” – १ या शीर्षकाखाली प्रकाशित झाला आहे, ही “पाऊलखुणा” नावाची लेखमाला आहे.)

लिंक  >> पाऊलखुणा – १

माझा जन्म माझ्या आजोळी झाला. आजी आजोबांच्या सुंदर बंगल्यात…ते ठाणे जिल्ह्यातील छोटसं टुमदार गाव! मोठ्या भावानंतर झालेलं मी दुसरं अपत्य! भावाचा जन्म वाडा या तालुक्याच्या गावी हॉस्पिटल मधे झाला.

 माझी आजी वाडा या गावातल्या सरकारी दवाखान्याच्या कमिटीवर चेअरपर्सन होती त्यामुळे ट्रेन्ड नर्सला घरी बोलवून आईचं हे दुसरं बाळंतपण आजीनं घरातच केलं! माझ्या जन्माच्या वेळी आजी आजोबा, मामा मावशी आणि माझा सव्वा वर्षाचा मोठा भाऊ इतकी माणसं घरात होती. कार्तिक प्रतिपदेचा, रात्री १२.४७ चा माझा जन्म !  तारीख   २० नोव्हेंबर १९५६ ! माझ्या आईला माझं नाव मृणालिनी ठेवायचं होतं  पण मामांनी चंदाराणी ठेवलं!जे मला मुळीच आवडायचं नाही.

खुप संपन्न घरात आणि निसर्गरम्य परिसरात माझा जन्म झाला, आजोबांनी तो बंगला त्यांच्या आमराईत बांधला होता, आजीआजोबा दोघेही सुशिक्षित, सुसंस्कृत, सामाजिक कार्यकर्ते, मामा पुण्यात एस. पी.काॅलेज मधे शिकत होते, मावशी नुकतीच मॅट्रीक पास झालेली, आजोळी आम्हा नातवंडांचे खुपच लाड झाले. मी आणि माझा मोठा भाऊ तीन चार वर्षाचे होईपर्यंत आजोळीच वाढलो. कारण माझ्या धाकट्या बहिणीच्या जन्माच्याआधी आई बरीच आजारी होती त्यामुळे आम्हा दोघांना माहेरी ठेऊन ती सासरी निघून गेली होती. आमचं हे आजोळ वाडा तालुक्यातलं तेव्हा ठाणे जिल्ह्यात असलेलं पण आता पालघर जिल्ह्यात गेलेलं छोटंसं गाव “वरले” नावाचं!गावात देशमुखांची सात आठ घरं बाकीचे कुणबी, कातकरी, कोळी, वारली लोक!

घरात कामाला कोळीण होती! ती घरात झाडलोट, धुणीभांडी, गड्यांसाठी नाचणीच्या आणि घरात नाष्ट्याला तांदुळाच्या भाकरी करत असे, चंदु आणि अप्पा नावाचे दोन गडी कायमचे जेऊन खाऊन होते.

माझी आजी सुगरण होती आणि वेगवेगळे पदार्थ करायची तिला आवड होती. माझं आजोळ आणि वडलांचं गाव दोन्ही कडे संपन्नता होती, भरपूर शेतीवाडी, दुधदुभतं, फळफळावळ, भाजीपाला, धनधान्य सगळं मुबलक होतं! आजोळ कोकणात तर वडिलांचं गाव घाटावर! मला ती दोन्ही गावं अजूनही खुप आवडतात. आमच्या शिक्षणासाठी १९६० साली आम्हा सख्ख्या चुलत पाच भावंडांना घेऊन आईनं पुण्यात बि-हाड केलं, आम्ही तीनचार वर्षे सदाशिव पेठेत तर तीन वर्षे डेक्कन जिमखान्यावर राहिलो! कधी दिवाळीच्या सुट्टीत तर कधी मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही आजोळी जायचो, दोन्ही मामा मुंबईत तर कोल्हापूर सासर असलेली मावशी पण काही काळ पुण्यात रहात होती, सुट्टीत मावस, मामे भावंडं भेटत असू. मोठे मामा सिव्हिल इंजिनियर होते, त्यांच्याकडे कंपनीची “डाॅज”  होती,काळ्या रंगाची,त्या गाडीतून ते आम्हाला जवळपास च्या ठिकाणी विशेषतः वज्रेश्वरीला  फिरवून आणत! मे महिन्यात भरपूर हापूस आंबे असत! जांभळं, पेरू, चिक्कू, केळी बंगल्या भोवती ही असंख्य फळझाडं आणि फुलझाडं होती.जंगलात जाऊन करवंदं तोडायची, तळ्यावर फिरायला जायचं, भावंडांबरोबर पत्ते, बुद्धीबळ खेळायचे…अशी मस्त सुट्टी असायची!

त्या बंगल्यात वरच्या मजल्यावर स्वतंत्र अभ्यासिका होती कपाटात, मांडणीवर असंख्य मासिके, पुस्तके होती, आम्हा मुलांसाठी चांदोबा, अमृत ही  मासिके आणली जात. गावात असलेले चुलत मामा, मावशी ही खुप प्रेम करायचे. आजोळच्या सगळ्या आठवणी हापूस आंब्यासारख्या मधूर आहेत!

मध्यरात्री जन्मताना घेऊन आले चांदणे

गर्द काळ्या त्या तमाला भेदून आले चांदणे

जन्म जेथे जाहला त्या गावात माझा चांदवा

त्याच गावी आठवांचे ठेवून आले चांदणे

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उन्हातल्या चांदण्याचा बहर….भाग 1 – स्व. दत्ता हलसगीकर ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? मनमंजुषेतून ?

☆ उन्हातल्या चांदण्याचा बहर….भाग 1 – स्व दत्ता हलसगीकर ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

करुणाघन, कोषातून बाहेर, आशयघन,उन्हातल्या चांदण्यात, चाहूल वसंताची, शब्दरूप मी, सहवास, ऋतू सोहळे, झोका ( बालकविता )हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. कवितेतील अमृतघन (समीक्षा), तरुणासाठी दासबोध (ललित), परखड तुकाराम (ललित), बहिणाबाईंची गाणी (संपादित)ही त्यांची इतर पुस्तके आहेत.

सोलापूरची अर्वाचीन साहित्यिक ओळख म्हणून कवी संजीव, कवी रा.ना. पवार आणि कवी दत्ता हलसगीकर या त्रयीकडे पाहिले जाते. नवकवी आणि साहित्याच्या अभ्यासकांच्या पाठीवर दत्ताजींचा नेहमीच प्रोत्साहनाचा हात असे. दत्ताजींच्या नावे महाराष्ट्र साहित्य परिषद, जुळे सोलापूर ही संस्था ‘ कविवर्य दत्ता हलसगीकर राज्यस्तरीय श्रेष्ठ साहित्य पुरस्कार ‘ देत असते. अनेक नामवंत साहित्यिकांना हा पुरस्कार प्रदान केलेला आहे.

मलेशियातील जागतिक मराठी साहित्य संमेलनात फक्त दत्ताजींच्या कवितांचा विशेष कार्यक्रम झालेला होता. कार्यक्रमानंतर रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना स्टँडिंग ओवेशन दिले होते.

आकाशवाणी हीरक महोत्सवानिमित्त १९ मार्च २०१३ रोजी दत्ताजींवर ‘ शुभंकराचा सांगाती ‘ नावाचा कार्यक्रम प्रसारित झाला होता. त्यात त्यांच्या कवितांचे वाचन, गायन सादर झाले होते.

 दत्ताजींच्या वागण्या, बोलण्यात एक अंगभूत साधेपणा होता. तो शेवटपर्यंत टिकून होता. वास्तविक जीवनातही ते अगदी मोकळ्या मनाने एक ‘जिंदादिल’ माणूस म्हणून वावरले. जीवनातील आनंद कसा घ्यावा यावर त्यांनी खूप सुंदर भाष्य केलेले आहे ते त्यांच्या ‘वय’ या कवितेत.

☆ वय ☆

वय झाले असेल माझे नाही असे नाही,

अजूनही फुलांची निमंत्रणे येत असतात मला |

डोळ्यावरच्या चष्म्याच्याही पलीकडचा

हिरवागार बहारदार खुणावतोय मळा ||

 

तुकारामाचा अभंग उत्कट ओढ लावतो तरी

अजूनही आर्त गझलेची चढते नशा | दिवसभर मग्न असतो माझ्या व्यापात मी

रुमझुमणारे पैंजण बांधून अजून येते निशा ||

 

सगळेच ऋतू वेढून आहेत, वसंत तर सखा

मस्त कोसळणार्‍या पावसात अजून राहतो उभा

दरवळणारा सुगंध घेऊन भेटते लाजरी उषा

वेड लावते अजून मला नक्षत्रांची आभा ||

 

वय म्हणजे नक्की काय, वार्धक्याची व्याख्या काय

न बोलवताही आपण, येतच असते मरण

पैलतीरावर नजर तरी जत्रेत रंगलो आहे

झुलते माझ्या दारात तारुण्याचे सदाबहार तोरण ||

 

असे हे मनाचे चिरतारुण्य त्यांनी शेवटपर्यंत जपले. कवितेच्या रचनात्मक स्वरूपावर हरखून न जाता आशयाशी प्रामाणिक राहायला हवं या विचारांवर ते ठाम होते. म्हणूनच ते सहजपणे लिहितात,

दारे उघडी ठेवली म्हणून फार बरे झाले

नाहीतर सडून गेलो असतो हवाबंद पोकळीत

उघड्या दारातून थोडीशी धूळ आली हे मान्य

वाऱ्यासवे सुगंधाच्या लाटाही आल्या झुळझुळत ||

रसिक मनाच्या दत्ताजींचा दृष्टिकोन खूप आशावादी होता. छोट्या छोट्या गोष्टीत जीवनातला आनंद शोधणारा होता. त्यात लढाऊ बाणा होता, तशीच फुलांची नाजूक गुंफण होती. ते म्हणतात,

जीवनात सारंच घडत नसतं आपल्या मनासारखं

नाही त्याचा नाद सोड, आहे त्याचा हात धर

जीवनावर प्रेम कर, जगणं फार सुंदर आहे

अमावस्येच्या रात्रीलाही नक्षत्रांच झुंबर आहे ||

ही त्यांची सदाबहार, सकारात्मक वृत्ती नीरस, कंटाळवाण्या नकारात्मकतेतून बाहेर काढणार आहे. असे हे विचारसंपन्न व्यक्तिमत्व ९ जून २०१२ ला आपल्यातून निघून गेले. जाता जाता ‘नेत्रदान’ करवून त्यांनी आपल्या शब्दांना कृतीची जोड दिली.त्यामुळे प्रतिभाशाली कवी बरोबरच सर्जनशील व्यक्ती म्हणून त्यांची प्रतिमा दृढ झाली.
अनंताच्या प्रवासाला जाण्याआधी ऋणनिर्देश करताना ‘तुमच्यामुळेच’ या कवितेत ते लिहितात,

तुमच्यामुळेच अंधारातून सुखरूप चालत आलो

आणि सुरेख घराच्या दाराआड येऊन पोहोचलो

अशी किर्रर्र रात्र होती उरात होती भीती

तुमच्या शब्दातला उजेड घेऊन,उजेड होऊन आलो ||

समाप्त

(संदर्भ — गुगल)

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

सातारा 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ यमक ☆ सुश्री सुषमा जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ मनमंजुषेतून ☆ यमक ☆ सुश्री सुषमा जोशी ☆ 

ज्योतिताईंनी एकदा विचारलं, “एका ओळीने शेवट झाला की पुढच्या कडव्याची सुरुवात त्याच ओळीनं होते, या काव्यप्रकाराला काय म्हणतात?”  माझा हक्काचा स्रोत  म्हणजे आईदादा!

दादांचा फोन बंद होता आठ दिवसांपासून! जाम बेचैन झाले. म्हणून आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट करून ठेवलं. पाचव्या मिनिटाला दादांचा फोन!

“अगं, आत्ताच फोन सुरू झाला आणि तुझा मेसेज वाचला. ऐक, यमकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तू म्हणतेस ते दामयमकाच्या जवळपास जाणारं यमक असेल, असं आई म्हणत्ये.”

मागून मला आईच्या नाजूक गुणगुणण्याचा आवाज आला. आईची स्मरणशक्ती अफाट! कोणतीही कविता पाठ असते.

‘श्रीपति झाला दशरथ-सुत राम दशाननासि माराया|

मा राया जनकाची होय सुता त्रिजगदाधि साराया|

सारा या प्रभुची हे लीला गाती सदैवही सुकवी|

सुकवी भवजलिं निधितें निरुपमसुख रसिक जन मनीं पिकवी|’

(पहिल्या ओळीचा शेवट ती पुढच्या ओळीची सुरुवात. पण अर्थ वेगळा.)

दादा म्हणाले, “हे बघ ऐक!” त्यांनी तोवर, ते आठवीत असतानाचं (आईला ८४ वर्षे पूर्ण होतील आता. दादा ८६ वर्षांचे!) मराठीचं पुस्तक आणलं होतं.  पाय प्रचंड दुखतात त्यांचे! पण ब्रिज आणि भाषा हे विषय आले की, त्यांना पंख लाभतात!

तर कुमार भा. वि. जोशी, इयत्ता आठवी, असं लिहिलेलं पुस्तक हातात घेऊन त्यांनी मला यमकाचे प्रकार सांगितले. थोडक्यात इथे मांडत आहे.

१) एकाक्षरी यमक: 

एक्या पदे भूमि भरोनि थोडी

दुजा पदे अंडकटाह फोडी

(डी ला डी हे एकाक्षरी यमक)

२) द्व्यक्षरी

दे तीसरा पाद म्हणे बळीला

म्हणोनी पाशी दृढ आकळीला

(ळीला हे द्व्यक्षरी)

३)चतुराक्षरी

बाई म्यां उगवताच रवीला

दाट घालुनि दही चरवीला

त्यात गे फिरवितांच रवीला

सार काढुन हरी चरवीला

(काय अफाट आहे ना हे!  प्रत्येक ‘चरवीला’ वेगळा आशय मांडतो.)

४) मग एकाचा अन्त्य आणि दुसऱ्याचा आदि चरण सारखा.

सेवुनि संतत पाला, संत तपाला यदर्थ करतात

तो प्रिय या स्तवना की, यास्तव नाकीहि तेंचि वरितात

५) दामयमकाचं उदाहरण वर दिलंच आहे.

६) पुष्पयमक: प्रत्येक चरणात यतीच्या ठिकाणी येणारं यमक.

सुसंगति सदा घडो… पडो.. झडो… नावडो

७) अश्वघाटी: घोड्यासारखी गती असलेलं यमक.

वाजत गाजत साजत आज तया जतन करुनि आणा हो

(वाजत गाजत साजत आजत याजत.. अशी गंमत आहे.)

मज मागे मत्स्यांचा हा रिपु – शशि- राहु- बाहु राणा हो

८) युग्मक यमक हा भन्नाट प्रकार आहे.

पायां नमी देइन वंश सारा

पा या न मी दे इनवंशसारा

(इन म्हणजे सूर्य, इनवंशसार म्हणजे सूर्यवंशात जन्मलेल्यांचं सार म्हणजे राम!)

९) समुद्रक यमक

हेही अफाट प्रकरण आहे. –

अनलसमीहित साधी राया, वारा महीवरा कामा

अनलस मीहि तसा धीरा यावा रामही वराका मा

(हे पृथ्वीपते धर्मा, वारा जसे अग्नीचे कार्य साधतो, तसे तुला  साह्य करण्यास मी सदैव तयार आहे. हे धीरा, बलरामही हवे तर येतील. मग वराका (बिचारी) मा (रुक्मिणी) तुझ्या साह्यास का येणार नाही?

अशा यमकांत चमत्कृती असते. पण काव्याचा ओघ नसतो. हे काव्य कृत्रिम असलं, तरीही हे प्रतिभेचंच देणं, लेणं आहे हे निःसंशय!

©️ सुश्री सुषमा जोशी 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print