मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 4 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे –4 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

शाळेमध्ये असल्यापासून अनेक स्पर्धांमध्ये मला बक्षीसं मिळत होती. सुरूवातीला अर्थातच वक्तृत्व स्पर्धेमध्ये. शाळेतली एक आठवण अजूनही माझ्या लक्षात चांगली राहिले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर केले होते. माझा नंबर ही आला होता, कितवा ते आत्ता आठवत नाही. पण बक्षीस समारंभ सुरू झाल्यावर माझे नाव पुकारले गेले. मी खाली ग्राउंड वर बसले होते. मी उठून उभी राहिले आणि मैत्रिणी बरोबर स्टेज कडे जाणार तोच बक्षीस देणारे प्रमुख पाहुणे मला म्हणाले, थांब तू बोलू नको मीच खाली येतो. आणि आश्चर्य म्हणजे स्टेजवरून प्रमुख पाहुणे माझ्यासाठी खाली आले आणि माझी पाठ थोपटून त्यांनी मला बक्षीस दिले. त्यांच्या या मोठेपणाची अजूनही मला आठवण येते.

अशीच एक कॉलेजमधली आठवण. त्यावेळी गॅदरिंग मध्ये माझे नृत्य ठरलेलेच असायचे. एफ वाय ला असताना बक्षीस वितरणासाठी माननीय शिवाजीराव भोसले यांना कॉलेजमध्ये बोलावले होते. त्यावेळी मला तीन_चार बक्षिसे मिळाली होती. माझे ठरलेले वक्तृत्व, कथाकथन, कॉलेजमध्ये अंताक्षरी स्पर्धा होती. आमच्या ग्रुपचे प्रमुख मीच होते. त्यामध्ये वेगवेगळे राऊंड झाले. आमच्या ग्रुप चा पहिला नंबर आला. शिवाय मला प्रश्नमंजुषा मध्ये बक्षीस मिळाले होते. स्टेजवर घेण्यासाठी मी तीन-चार दा गेले होते. गॅदरिंग असल्यामुळे साडी नेसली होते. त्यावेळी शिवाजीराव भोसले सरांनी माझे कौतुक केले आणी म्हणाले,”किती बक्षीस मिळवलीस ग”. अजूनही त्यांचा तो आवाज, कौतुकाचे बोल माझ्या कानात आहेत. त्यांनी दिलेली शाबासकी माझ्या डोळ्यांना ना न दिसता ही मला जाणवली. विशेष म्हणजे त्यांच्या भाषणामध्ये अर्धा भाग ते माझ्यावरच बोलले. माझ्यावर एक छोटीशी कविता सुद्धा केली आणि ती म्हणूनही दाखवली. मला त्याचे शब्द आठवत नाहीत. पण अर्थ आठवतो आहे. परमेश्वर मला म्हणतोय, तुझे डोळे माझ्याकडे आहेत, पण माझं लक्ष तुझ्याकडे आहे. हा मोठा आशय अजूनही माझ्या लक्षात आहे. त्याचा गर्भितार्थ मी कधीच विसरणार नाही.

२००७ च्या एप्रिल मध्ये, रंगशारदा मिरज तिथे मुंबईच्या लोकांनी योगाचे शिबिर घेतले होते. केला मी जात होते. शेवटच्या दिवशी गप्पांमध्ये मी नृत्य शिकते, विशारदची परीक्षा देणार आहे, असं त्यांना सांगितल्यावर त्यांना खूपच आश्चर्य वाटलं. जुलैमध्ये त्यांचा मला फोन आला. गुरुपौर्णिमेनिमित्त मुंबईला एका कार्यक्रमात नाच करशील का असे विचारले. येण्या-जाण्याचा खर्च आम्ही करतो. बाबांनी होकार दिला. खरंतर माझ्या मनात शंका होती. मुंबईच्या स्टेजवर माझे कसं होईल ही भिती होती, माझाच मला अंदाज नव्हता. पण काय सांग त्या लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. नाचाचे पूर्ण गाणे संपेपर्यंत टाळ्या थांबल्या नाहीत. माझा मेकअप, आत्मविश्वास यामुळे त्यांना मी अंध आहे, हे पटतच नव्हतं. कितीतरी बायकांनी नंतर माझा हात हातात घेऊन, गालावरून हात फिरवून, अगदी डोळ्यांना हात लावून खात्री करून घेतली. त्यावेळी मुंबई गाजवली. कितीतरी संस्थांमार्फत मला बक्षीस मिळाली.

आणखी एक अनुभव सांगते. सांगलीमध्ये अपंग सेवा केंद्रातर्फे माझा एक कार्यक्रम झाला. तो पाहायला वालचंद कॉलेजचे रिटायर्ड जोगळेकर सर आले होते. त्यावेळी ते 80 वर्षांचे असतील. माझा नाच झाल्यावर मुद्दाम मला भेटून ते म्हणाले,”छान नृत्य केलेस.अग, आम्हाला रस्त्यावरूनही नीट चालता येत नाही.”त्यांचं हे कौतुक ऐकून उत्साह वाढला आणि आपण काही कमी नाही हे जाणवले. नुसतं सहानुभूती म्हणून ते बोलत नव्हते, हे त्यांच्या शब्दातून कळले.

या माझ्या नृत्यासाठी माझ्या मैत्रिणी, शिक्षिका आणि माझी आई या सगळ्यांचे खूपच सहकार्य आणि मदत मिळत होती. माझी ड्रेपरी दागिने घालणे , मेकअप करणे यासाठी त्यांची मदत मोलाची होती. स्टेजवर जाऊन उभ करायलाही कोणी तरी मैत्रीण लागायची. नृत्याचे फोटो आले की त्याच मला वर्णन करून सांगायच्या. असे ते शाळा कॉलेजचे रम्य दिवस होते.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दोन जीव वाचले ☆ श्रीमती सुधा भोगले

☆ मनमंजुषेतून ☆ दोन जीव वाचले ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

अलिबाग, रायगड जिल्ह्यातील, तालुक्याचे गाव! अलिबाग पासून सुमारे तीन मैलावर थळ हे लहानसे खेडं!आगर भागात ब्राम्ह्णाची पन्नास, शंभर घरे, थळ बाजाराकडे कोळी, आगरी, यांची वस्ती! आता आर. सी. एफ.  या रासायनिक खत प्रकल्पामुळे, थळ–वायशेत हे जोडनाव आता प्रसिद्ध झाले.

आशा या गावात, मोरुकाका सुंकले एक नामदार व्यक्ती होत्या.  शेतीवाडी, असलेले, गणपतीकार, आयुर्वेदिक वनस्पती, औषधींची जाण असणारे गावच्या जत्रेत, हलवाई होऊन दुकान मांडणारे, थोडीफार भिक्षुकी करणारे, असे, बहुआयामी व्यक्तीमत्व! गोरेपान, उंच, धोतर आणि वर लांब बाह्याचा पांढरा शर्ट, डोक्याला टक्कल, कानात बिगबाळी अशी त्यांची मूर्ती दिसे. ओटीवर त्यांचेकडे अनेकांची दिवसभर ये जा असे.

त्यावेळी तो चैत्र महिना होता. घरात, आगोटीची (पावसाळ्या पूर्वीची) कामे चालू होती. त्यांची लाडकी लेक सुभद्रा, सुभाताई, पहिलटकरीण, बाळंतपणाला आली होती.

आगारात असलेली, त्यांची शेतीवाडी संपन्नतेत होती. अलीकडे देशाला स्वातंत्र मिळाल्यावर, काही झळाही त्या घराला बसल्या होत्या. त्यात दहा बारा मुले, गाई–गुरे, शेती-वाडी करत, कालक्रमणा चालु होती.

सुभाताई, त्यांची लेक,  गोरीपान, धारदार नाक, लांब केस, बांधेसूद, देखणी होती. बायला काही कमी पडू द्यायचे नाही असे त्या प्रेमळ पित्याला वाटे. आता तिचे दिवस भरत आले होते. त्या दिवशी दुपारपासून पोह्याचे पापड करायला शेजारपाजारच्या बायका आल्या होत्या. उखळात डांगर कुटायला, कांडपीणींची लगबग चालु होती. आणखीन काहीजणी भात कांडत होत्या.

सुभाताई पापड लाटायला बसली होती. हळूहळू, संध्याकाळ होऊ लागल्याने, कामे आवरती घ्यायला सुरवात झाली. इतक्यात, सुभाताई आपल्या पोटाचा भार सावरत उठली. हातात दोर बांधलेला पोहरा आणि काखेत कळशी घेऊन, “मी पलीकडल्या, वाडीतले गोड ढोऱ्याचे पाणी घेऊन येते”!, असे म्हणत,  ती चालायला लागली. सगळ्या म्हणाल्या, “अग, सुभाताई, तू पोटुशी कशाला जातेस इतक्या तिन्हीसांजा. ”पण ती ते ऐकायला ती थांबलीच नाही. आणि ती लांब अर्धाकीलोमीटर असलेल्या वाडीत गेली सुध्दा. तेथे पोहचेपर्यंत तशा तिन्हीसांजेच्या सावल्या पडू लागल्याच होत्या. ताईंने पोहरा विहिरीत सोडला त्या शांत वातावरणात, बुडूबुडू आवाज येत पोहरा आडवा होऊन पाणी भरून आत गेला. मग दोर ओढत ताईने कळशी भरून घेतली. पोहरा व दोरगुंडाळून घेतले. कळशी

घ्यायला वाकली, तर गर्भभाराने जड झालेला देह सावरता सावरता, तिचा पाय घसरला. ती त्या ढोऱ्यात घरंगळत गेली तिलाच कळले नाही. दोन गटांगळया खाल्ल्यावर तिच्या लक्षात आलं पोटाकडे हाताने पाणी ओढले की आपण तरंगू शकू. तिने प्रयत्न केला आणि ती काठाला आली. तिने काठाला वरून आलेल्या वेलींचा ताणा घट्ट पकडला. ती वर येण्याचा प्रयत्न करू लागली. एवढ्यात, वाळलेल्या झाडाच्या पाल्याचा चुरूचुरू आवाज ऐकू आला. कोणीतरी येत आहे ह्याची चाहूल लागली. तिने हाकारले, “कोण आहे? इकडे या”! मी या विहिरीत पडले आहे!” आवाज ऐकून तो गुरे चरायला घेऊन गेलेला कातकऱ्याचा मुलगा विहिरीत डोकावला. त्याने तिला हाताला धरुन वर काढले. विहिरी बाहेर पडलेली सुभा, जराही घाबरली नाही, तिने धीर एकवटून आपली कळशी कंबरेवर घेतली. पोहरा उचलला आणी निघाली घराच्या दिशेने! तो मुलगा आवाक होत पहात राहिला, व तिच्या मागे चालू लागला.

घर जवळ आलं, पायरीवरून अलगद् चढत, ताईने कळशी उतरवली. इतक्यात घरातले सर्व बाहेर पडवीत आले. आगो, ताई, ”हे काय? एवढी कशी भिजलीस!”

कातकऱ्याच्या मुलाने सर्व हकिकत सांगितली. सर्वजण स्तब्द होऊन पाहात राहिले. आण्णा, म्हणाले, ”अग, बायो, काही झाले असते तर केवढा आपेश आला असता आमच्यावर!”, पण, देवाचीच कृपा दोन जीव वाचले.”

ह्या घटनेनंतर काही प्रश्न अनुत्तरीत राहिले. ताईला कोणीच कसे अडवले नाही. की  कामाच्या धांदलीत तितकेसे लक्षात आले नाही.

 

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नात्यांचे मोकळेपण ☆ सौ. सावित्री जगदाळे

☆ मनमंजुषेतून ☆ नात्यांचे मोकळेपण ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆ 

एक लेख वाचून वाचकाने फोन केला, “लेख आवडला पण ” गढवापुढे गायली गीता… असं मुलगा आईला म्हणतो ते खटकले.”

“आई मुलात मोकळेपणा असल्यावर म्हणू शकतो. त्याने म्हण वापरली. आईला थोडेच गाढव म्हटला?”

लिहिताना असा विचार मनात येत नाही, लोक कसा विचार करतील वगैरे… कल्पनेतली पात्रे घेऊन लेखन करताना कधी कधी एकतर्फी पना येतो. मग वाचक असे कान धरतात. अशा वाचकांचा खूप आदर वाटतो. प्रत्येकाने जाब विचारायलाच हवा. प्रश्न पडायलाच हवेत.

आई मुलाचे नाते वात्सल्यचे असते. एकमेकांचा आदर प्रेम असते म्हणून मुलाने काही सांगू नये का? मुलगा का नाही आईला नव्या विचारांची शिकवण देऊ शकत?

आपल्या शेतकरी, कुनब्यांच्या घरी शिक्षणाची गंगा आता कुठे वीसतीस वर्षांत आलीय. शिकलेली मुलं सांगतात आईला  वैज्ञानिक गोष्टी.  अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, सण, व्रते यांच्यातील फोलपणा त्यांना समजलेला असतो. अशिक्षित, अर्धशिक्षित आईला तो सांगू शकतो. नव्हे सांगतातच!!

शिकले तरी शिक्षणात देव, धर्म, अंधश्रद्धा याबद्दल कुठे काय शिकवतात. मुळात विचार करायला, प्रश्न उपस्थित करायला शिकवत नाहीत. प्रश्न विचारणारा उद्धट ठरतो. आज्ञा पालन करणे हाच सद्गुण ठरतो. नवे काही शोधून काढणाराला विरोध सहन करावा लागतो.

बाईच्या बुद्धीवर सण, देव, धर्म, व्रते यांची एवढी झापडे बांधली आहेत की, या जगात वेगळे काही असू शकते यावरच ती विश्वास ठेवत नाही. ज्या देवीची ती पूजा करते त्या शक्तिशाली देवीचा आपण अंश आहोत हे वैज्ञानिक सत्य तिला कुणी सांगितले नसते, शिकवलेले नसते. पूजा, कर्मकांडे करत राहणे म्हणजेच खरी भारतीय नारी असणे असं शिकलेल्या बाईला ही वाटते.

साधं कुंकवाचा करंडा सांडला तरी तिला सतत अशुभाची चुटपुट काही दिवस लागून राहते. हातात बांगडी नसणे तिला अशुभ वाटते. केस कपण्याबद्दल तर इतक्या टोकाच्या अंधश्रद्धा आहेत, याची शहरी लोक कल्पनाही करू शकणार नाहीत. आताच्या काळात ही.

‘केस कापल्याने तिच्या नवऱ्याचे आयुष्य कमी होते.’

केसांचा कितीही त्रास झाला, जटा आल्या तरी बाई केसाला कात्री लावत नाही.

कुलाचार कुलधर्म या नावाखाली तर बाई वर्षभर पिळवटून जाते. पूर्वीसारखे घर भरलेले नसते. एक किंवा दोन मुले. ती ही शहरात. मग एकट्याने सगळे रेटायचे. भीती पोटी. आपली पोरं असतील तिथे सुखरूप ठेव म्हणून देवापुढे भाकणुक करायची. सणाला नाट लावायचा नाही. अशावेळी आईला होणारा त्रास पाहून कुठलाही शहाणा समंजस मुलगा सात्विक संतापाने , पोटतिडकीने सागणारच की. मग सांगताना आईनेच शिकवलेल्या म्हणी ओठावर येणारच की….

हेच तर जिव्हाळ्याचे नाते असते. आपल्या लोकांना शहाणे करून सोडण्याची कळकळ असते. आता हे बोलताना वडील असते तर भाषा थोडी वेगळी असली. पण आई ही जन्मताच मैत्रीण असते. बाळ तिच्याशी सगळे मोकळेपणाने बोलते. सांगते. मनात काही ठेवत नाही. मैत्री अशीच असते ना…

आईसारखी मैत्रीण कुठे असणार? आईला तरी मुलासारखा विश्वासाचं मित्र कुठे मिळणार?

आईने शिकवलेल्या पायावरच असे प्रश्न निर्माण होतात. गणपतीला आणायची पत्री आता कुठे मिळते का?  साध्या दुर्वा मिळणे मुश्कील झाले आहे. पेपरात येते या पत्री औषधी असतात म्हणून वाहा. पण त्या बाईची किती त्रेधतिरपीट उडत असेल. कारण तिलाच पुण्य मिळवायचं असते पोरा बाळांसाठी….

असे महिन्यातून एक दोन तरी सन व्रते असतात. हे करा म्हणजे ते होईल. असे करा म्हणजे तसे होईल…

एका अमेरिकेतल्या माणसाचा व्हिडिओ आला. सगळे सण कसे आम्ही मंत्र पाठणात करतो. वगैरे…

त्या काहण्यात काय असते, शंकर पार्वतीला सांगतो, ” हे व्रत खूप श्रेष्ठ आहे. जसे चार वरणात ब्राम्हण श्रेष्ठ तसे सगळ्या व्रतात हे व्रत श्रेष्ठ आहे. हे व्रत करणाराला अखंड सौभाग्य प्राप्त होते. पण जे करत नाहीत त्याला वैधव्य, दारिद्य्र येते.”

हे ऐकूनच डोके सटकले. अज्ञानी असताना हे सगळे मी करत होते पण अताही अशा कहाण्या ऐकूण व्रते करायची. तेही अमेरिकेत… व्वा व्वा… तिथे सौख्य मिळवायचे. आम्ही भारतीय परंपरा सांभाळतो याचा झेंडा मिरवायचा.

कशाने अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि कशाने दारिद्र्य येते हे यश प्राप्तीची पुस्तके वाचून कळू येईल. पण परंपरा, संस्कृती याची नशाच भारतीयांना अतोनात आहे. वैज्ञानिक साधने वापरून परंपरा सांभाळतात. पण अशा परंपरा सांभाळण्यासाठी आपण काही साधने निर्माण करावी असं काही भारतीयांना वाटत नाही. पत्री औषधी आहेत ना तर का नाही करत  डोंगर, टेकड्यांवर याची लागवड???

सुबाभूळ, गुलमोहर, सप्तपर्णी, असे झटपट वाढणाऱ्या झाडांचे वृक्षारोपण करायचे आणि चिमण्या सारख्या पाखरांना दाहीदिशा वनवास आणायचा. संस्कृती, परंपरेचा डांगोरा पिटत रह्याचे.

थोडे विषयांतर झाले. मुलाचे आणि आईचे नाते हा विषय होता.

जात, धरमदेव, परंपरा या मानवाने निर्माण केल्या आहेत. त्याची भीती बाळगू नये असं मुलगा आईला सांगू शकतो. पण आईला लगेच पटत नाही. तिची मानसिकता (त्यालाच म्हणतात निष्ठा) एवढी लवचिक नसते. वाद घालतो मुलगा. आधुनिक विचारांच्या मुलांची घुसमट होते. सण व्रते हे कसे थोतांड आहे. हे सांगताना नवीन पिढीची दमछाक होते. मग मुलगा म्हणतो, ” गढवापुढें वाचली गीता….”

मी माझ्या  लेकसुनेला टिकली लावण्याबाबत सक्ती करत नाही. तिने मंगल सूत्र घातले की नाही याची चौकशी करत नाही. शिकल्या सवरल्या पोरींना कशाला अशी बंधने घालायची. कितीही शिकले , नोकरी केली, बिझनेस केला तरी त्यांना चूल मूल सुटत नाही. आणखी ही जोखडं त्यांच्या खांद्यावर का द्यावीत?

मेल्यावर आमचे म्हाळ वगैरे घालू नयेत असे मी  मुलाला स्पष्ट सांगणार आहे. तेवढे मैत्रीचे नाते आहे आमच्यात. अशा गोष्टींवर वाद घालतो आम्ही.

 

© सौ. सावित्री जगदाळे

१८/९/१८

१००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बस तुम कभी रुकना मत☆ सुश्री संध्या बेडेकर

☆ मनमंजुषेतून ☆ बस तुम कभी रुकना मत☆ सुश्री संध्या बेडेकर ☆ 

आज आजी उदास आहेत.•••• हे आजोबांच्या लक्षात आल .••काय झालं ग??? आजोबांनी विचारल .•• आजी म्हणाल्या•• अहो, आता थकवा येतो .••आधी सारखं राहिलं नाही.•• आता गडबड ,तडतड सहन होत नाही.•• कुठे जायचं  म्हंटल तर जास्त चालवत नाही. •••अॉटो मधे चढताना त्रास होतो .••• कधी भाजीत  मीठ टाकायला विसरते तर कधी जास्त असत.कशाकरीता हे एवढं आयुष्य देवाने दिल आहे. ••माहित नाही .••

आजोबा म्हणाले,••• देवाचा हिशोब मला माहित नाही.••आणि त्याच्या निर्णयात आपण ढवळाढवळ करू शकत नाही. ••त्याच्या planning मधे  एक क्षणाचाही बदल करणे. आपल्या हातात नाही.•• जे आपल्या हातात नाही, त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या हातात काय आहे?? त्याचा विचार करावा.•• अग ,वयानुसार हे सर्व होणारच.••  आधीचे दिवस आठव ना•• किती काम करायची .पूर्ण घर तू खूप छान सांभाळले••. मला कशाची काळजी नव्हतीच कधी .•••  आता  वयामाना  प्रमाणे हे सर्व होणारच  पण त्यातुनच मार्ग काढायचा असतो .•••आलेला दिवस आनंदात काढणे ••आपल्या हातात आहे••. जिवनाच्या प्रत्त्येक फेज मधे थोडे शारिरीक बदल होतातच .•••थोडे आपल्या ला करायचे असतात. ••आपली ‘ lifestyle’reorganize करायची ,••म्हणजे ,आयुष्याची घडी, परिस्थिती प्रमाणे बदलायची असते •••.कळल का ?

आजोबा पूढे म्हणाले •••• चल, आज सायंकाळी बाहेर जाऊ  या  आपण. छान ती नारंगी साडी नीस. •• बाहेरच जेवू ••  .  आजोबा संध्याकाळी आजींना घेऊन बाहेर पडले. ••व  जवळच असलेल्या  बसस्टोप वर जाऊन बसले.•• दोघे बराच  वेळ तेथेच  गप्पा मारत बसले . ••आजोबा आजी ना म्हणाले•• अगं, पाय दुखत असतील  तर ,मांडी घालून बस छान ••. . नंतर ,’गणेश भेळ ‘खाऊनच घरी परतले. अगदी वयाला व तब्येतीला  शोभेसे  outing आज होते दोघांचे .••• आजींची उदासी मात्र कुठे पळाली?? हे त्यांना कळलेच नाही .•• अगदी ‘refresh’ झाल्या . ••आज आजोबांनी आजीसाहेब  साठी  on line  ‘Mobile  stand ‘ मागवला. मोबाईल पकडून आजींचा खांदा दुखतो ना म्हणून .•••

आज कुलकर्णी आजींनी तर आजोबांना सकाळीच  सांगुन  टाकलं ,की मी आज सायंकाळी स्वयंपाक करणार नाही .••काही तरी चमचमीत खायला  घेऊन या .••• आजोबांनी आनंदाने समोसे ,ढोकळा , खरवस   दोन पूरण पोळ्या आणून आजींची इच्छा पूर्ण केली . ••.ते बघून आजी म्हणाल्याच अहो, एवढ आणलत  ?? अग आज आणि उद्या मिळुन संपेल की .•••  आज कुलकर्णी आजीं आजोबांनी पार्टी छान  झाली. ••••

कोणी तरी खरच  खूप छान म्हंटल आहे •••

“खुशियां बहुत सस्ती है इस दुनिया में ,

हम ही ढुंढतें फिरते हैं, उसे महँगी दुकानों में”।”

देशपांडे आजोबा बऱ्याच वेळा पासुन एका बाटलीचे झाकण उघडायचा प्रयत्न करत होते. ••ते पाहून अजय म्हणाला , द्या आजोबा मी उघडून देतो. •••तेंव्हा आजोबा म्हणाले••• अरे ,नको मी उघडतो. ••आता आम्हाला प्रत्त्येक  कामात वेळ लागतोच . हे natural आहे . ••पण काही हरकत नाही. जो पर्यंत करू शकतो तोपर्यंत काम करायचे  .हे मी ठरवलं आहे .•••  रोज फिरायला जाणे, भाजी आणणे, dusting करणे, भाजी  चिरणे   ,washing machine मधे धुतलेले कपडे वाळत घालणे‌, कपड्यांच्या घड्या घालणे ,अशी बरीच कामांची जबाबदारी मी घेतली आहे. तुझ्या आजीला पण मदत होते. व माझा वेळ जातो . Something new and different .I am enjoying it. And I feel good .

तो तुमचा actor आहे ना, अक्षय  कुमार त्याने एका advertisement मधे म्हंटले आहे

“बस ,तुम कभी  रुकना मत”

अक्षय कुमार ने  म्हंटलेले हे वाक्य  .मला  खूप आवडलं.

एक  छोटंसं वाक्य.••  मोजक्या शब्दात ••.

पण किती अर्थपूर्ण .••जेवढ्यांदा वाचावे, तेवढाच त्याचा अर्थ परत दर परत उघडत जातो .•••एक छोटासा उपदेश जिवनाला वेगळ्याच दिशेने वाटचाल करायची  स्फुर्ती  देतो..••  विचारांत परिवर्तन  आणत. ••••

तो म्हणतो •••••• कधी थांबू नका,•• चालत रहा. •••• म्हणजेच  ‘active’ रहा.  ‘मनाने आणि शरीराने .’

वाहत पाणी बघताना,  एक वेगळीच उर्जा  निर्माण होते .’ धारा ‘ म्हणजे पूढे पूढे जाणारी, वाहणारी .•••• तेच  जमलेल  पाणी म्हणजे अनेक रोगांचा ऊदगम. ••म्हणून    पाण्याला जमू देत नाही आपण.•••  जमलेल्या पाण्यात मच्छर कीडे पडतात•• .पाण्याला  वास येतो डेंग्यू पसरतो.•••

आयुष्याचे पण तसेच आहे. •••शक्य तेवढ active राहणे ही प्रत्येकाचीच आवश्यकता असते •••.जसं जमेल ,जे जमेल, जे आवडेल ,जे झेपेल  , ते करत रहाणे गरजेचे आहे. •••••

” चलती का नाम ही तो  जिंदगी है “।

आपल्या पीढीने तरूणपणी  एकमेकांचे हात हातात  घेतले नाही  /नसतील  .•••पण वयाच्या या टप्प्यावर, एकमेकांचा हात प्रेमाने, काळजी ने ,विश्वासाने , हातात घेणे  ही काळाची गरज आहे . ••••

“कुछ लोग हमेशा खुश और संतुष्ट रहते हे•••!

इसलिए नहीं की उनके जीवन में  सबकुछ ठीक होता  है  •••!

बल्कि इसलिए की उनकी सोच हर हाल में सकारात्मक होती है”•••!!!

“ना  थके  कभी  पैर

ना कभी हिम्मत हारी है ।

जज्बा  है परिवर्तन का जिंदगी में ,

इसलिये सफर जारी  है ।

“प्रत्त्येक दिवस उत्सव म्हणून साजरा करा .”

“बस , तुम कभी  रुकना मत “।

 

(सहजच मनातल शब्दांत )

© सुश्री संध्या बेडेकर

भ्रमणध्वनी:- 7507340231

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनात घर करुन राहिलेल्या कधीच न हरवणार्या आठवणीची गोष्ट….. ‘निसटून गेलेलं बरंच कांही….’ ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ मनमंजुषेतून ☆ मनात घर करुन राहिलेल्या कधीच न हरवणार्या आठवणीची गोष्ट….. ‘निसटून गेलेलं बरंच कांही….’ ☆ श्री अरविंद लिमये☆

‘c/o जानकीबाई बापट, दुसरा मजला, नूर बिल्डिंग रेल्वे स्टेशनसमोर, दादर(पश्चिम) मुंबई’ हा माझ्या आयुष्यातल्या कधीकाळच्या अडीच एक वर्षांसाठीचा पत्रव्यवहाराचा पत्ता ! जुनी महत्वाची कागदपत्रे जपून ठेवतानाच अगदी जीर्ण झालेली पन्नास वर्षांपासूनची अनेक पत्रेही मी जपून ठेवलेली आहेत. नोकरी निमित्ताने प्रथमच घर सोडून मुंबईला जातानाच्या अनेक हळव्या अस्वस्थ आठवणी यातील प्रत्येक पत्राला या ना त्या रुपाने लगडलेल्या आहेत. जेमतेम वीस वर्षाचं माझं वय. घरापासून पहिल्यांदाच दूर जातानाचं हळवेपण आणि आयुष्यात मुंबईला प्रथमच आणि तेही दीर्घ वास्तव्याला जाताना असणारं अपरिहार्य दडपण सोबत घेऊन घराबाहेर पडल्यानंतरच्या पुढच्या अडीच एक वर्षातल्या असंख्य आठवणी सामावून घेतलेली मला घरुन येणारी ती जुनी पत्रे. त्या पत्रांवरचा ‘c/o जानकीबाई बापट. . . . ‘ हा पत्ता जेव्हा जेव्हा नजरेस पडतो, तेव्हा कधीच विसरता न येणार्या बापट काकूंच्या आठवणी उसळी मारुन वर येऊ लागतात.

बॅंकेत जाॅईन झाल्यानंतर काही दिवसांनंतरचा आमचा संपर्क न् सहवास पुढे माझी कोल्हापूरला बदली होईपर्यंत अबाधित राहीला,तरी त्यांचा निरोप घेऊन निघताना घरी ओढ घेणारी माझी पावलं त्यांच्या दारात अडखळली होती एवढं मात्र खरं. माझ्या नेमक्या गरजेच्या वेळी मला मदतीचा हात द्यायला त्या माझ्या आयुष्यात आल्या आणि स्वत:ची दुखरी आठवण मागे ठेऊन निघून गेल्या.

काकूनी त्यांच्या लग्नानंतर नूर बिल्डिंग मधल्या चाळीतील  दोन रुम्सच्या त्या ब्लाॅकमधेच गृहप्रवेश केला होता. आता उतारवयात तो ब्लाॅकच त्यांच्या चरितार्थाचं साधन बनलेला. त्या ब्लाॅकमधे माझ्यासारखी मुंबईत नोकरीनिमित्ताने आलेली मुलं त्या पेईंग गेस्ट म्हणून ठेऊन घ्यायच्या.  एकावेळी जास्तीतजास्त चार.  फक्त रहाणं,सकाळचा चहा, अंघोळ अशी सोय माफक दरात व्हायची. त्या दोनशे रुपयात त्याकाळी त्यांचा चरियार्थ जेमतेम चाले. त्यातही काटकसरीची सवय अंगी बाणवून त्या चार पैसे बाजूला ठेवीत.

तिथे माझ्यासाठी ओळख करुन घ्यायला आणि नीट सगळी चौकशी करायला मीच आग्रह केला म्हणून माझी डोंबिवलीची मावशीच आधी त्याना भेटून आली होती.

“त्याला सवय नसल्याने डोंबिवलीहून रोज लोकलच्या गर्दीतून ये जा करणे त्याला त्रासाचे वाटतेय हो. त्यामुळे इथे यायचं म्हणतोय. तो इथे राहील,दोन्हीवेळचा जेवणाचा डबा त्याच्यासाठी डोंबिवलीहून  मी पाठवीन. इथं तुमच्याकडे त्याची जेवणाची सोय होऊ शकली असती तर हा प्रश्न नव्हता. जमेल का तुम्हाला. . . ?”

“अडकून पडायला होतं हो. शिवाय मुलांच्या आवडीनिवडी फार असतात. म्हणून मी ते गळ्यात घेत नाही. ”

“त्याच्या काहीही आवडीनिवडी नाहीयेत हो. हवं तर चार दिवस करुन बघा. नको वाटलं तर बंद करा. सोय झाली तर त्याला निदान रात्रीतरी गरम जेवण मिळेल. म्हणून गळ घालतेय. शेवटी तुम्ही म्हणाल तसं”

आमचे ऋणानुबंधच असे की काकू राजी झाल्या. आमचं ना नातं ना गोतं. पण काकूनी मला त्या एका होकारात घरचं जेवणच नाही फक्त तर घरपणही देऊ केलं होतं. त्यामुळे अगदी थोड्या दिवसातच मी त्या घरचाच होऊन गेलो होतो जसा कांही. त्या काळी मोबाईलच काय घरोघरी फोनही नव्हते. वडील आजारी. घरुन पाठवलेलं साधं चार ओळींचं खुशालीचं पत्रही आठ दिवसांनंतर हातात पडायचं. घरच्या काळजीने न् आठवणींनी मन व्याकुळ होत असे. आधी मावशीने आणि नंतर या बापटकाकूनी दिलेलं घरपण त्या मनोवस्थेत तर माझ्यासाठी लाखमोलाचं होतं. त्याकाळी घरोघरी गॅस नव्हते.  अल्युमिनियमच्या कुकरमधे वातीच्या स्टोव्हवर रोजचा डाळभात शिजायचा. सकाळी बरोब्बर साडेआठ वाजता वाफाळलेला गरम भात माझ्या पानात असायचा. भात संपेपर्यंत  तव्यावर मऊसूत पोळी तयार असायची. स्वैपाक साधाच पण अतिशय रुचकर असायचा. प्रत्येक घासागणिक तृप्ततेबरोबरच कृतज्ञतेची जाणिव मनात झिरपत रहायची.

त्या आनंदी,हसतमुख होत्या. समाधानी होत्या. त्या मुखवट्याआड एखादं बोचरं दु:ख लपलेलं असेल अशी शंकाही मला कधी आली नाही. त्यांच्या मुलीचं लग्न होऊन ती सासरी सुखात होती. ती, जावई, नातवंडं सगळेच यांना ‘ब्लाॅक विकून टाका.  आमच्याकडे या. आरामात रहा’ म्हणायचे. आणि या ‘होईल तितके दिवस रहाते. ‘म्हणत हसण्यावारी न्यायच्या. काकूंचा भाऊ पूर्वापार नागपूरला. तेच यांचं माहेरघर.  दिवाळीनंतर दरवर्षी न चुकता एक महिना त्या माहेरघरी जाऊन राहून यायच्या. एका वर्षी त्या नागपूरहून परत आल्या न् लगेच दुसर्या दिवशी चारधाम यात्रेची चौकशी करुन बुकींग करुनही आल्या. आठ दिवसानी यात्रेचा प्रवास सुरु होणार होता. त्या रात्री पान वाढता वाढता त्यानी हे सांगितलं

“काकू,लांबचा प्रवास करुन कालच तर आलायत.  पुन्हा इतक्या लगेच चारधामची दगदग कशाला? पुन्हा नंतर जा कधीतरी”

“नंतरचं कुणी पाहिलंय आला दिवस आपला” त्या कसनुसं हसत म्हणाल्या. एरवी देवधर्म, सोवळं-ओवळं या कशाचं कधी अवडंबर न करणार्या त्यांची चारधामची ओढ आश्चर्य वाटावं अशीच होती. शिवाय लेक जावयालाही बुकींगपूर्वी त्यानी विश्वासात घेतलेल़ं नव्हतं.

“बरोबर कोण मग?” काळजीपोटी मी विचारलं.

“यात्राकंपनी बरोबरच तर जातेय. मग वेगळी सोबत ती कशाला?” त्या बोलल्या खर्या पण का कुणास ठाऊक जाताना स्वस्थचित्त नव्हत्या एवढं खरं. ट्रीपहून परतल्या ते तीच अस्वस्थता बरोबर घेऊन.

“काकू, प्रवासात कांही त्रास झाला का? तब्येत बरी नाहीय तुमची. “रात्री त्यानी अगदी घासभरच भात घेतला ते पाहून जेवताना मी विचारलं. त्यांचे डोळे भरुन आले. त्या मानेनेच ‘नाही’ म्हणाल्या.

“काकू, मला सांगा बघू काय झालंय. मोकळेपणानं बोललात तरच समजेल ना मला ?” मी काकुळतेने हे बोललो न् त्याचाच धक्का लागल्यासारखा त्यांचा बांध फुटला. त्याही परिस्थितीत उचंबळून आलेलं मनातलं सगळं त्यानी कसंबसं थोपवलं. स्वत:ला सावरलं.

“तुझं जेवण होऊ दे. मग सांगते. आत्ता बोलले तर घास अडून राहील उगीचच. . “त्या शांतपणे म्हणाल्या. त्या रात्रीचं ते सुग्रास जेवणही मला बेचवच वाटत राहीलं. ऐकलं ते मला उध्वस्त करणारं तर होतंच आणि त्या माऊलीची किंव वाटावी असंही. इतके दिवस त्यांच्या आयुष्यातली ही पडझड त्यानी मनातच कोंडून ठेवली होती. पण आज. . . . ?

त्याना एक मुलगीच नव्हती फक्त. एक मुलगाही होता. थोड्याशा आजाराचं निमित्त होऊन त्यांचा नवरा गेला तेव्हा ही दोन्ही भावंडं शाळकरी वयाची होती. आल्या परिस्थितीला तोंड द्यायला आपल्या मुलांकडे पाहूनच तर त्या पदर खोचून उभ्या राहिल्या. शिक्षण जेमतेम.  स्वैपाकपाण्याची कामं करुन पुढे मुलांच्या शिक्षणाच्या वाढत्या खर्चाचं काय करायचं?मग त्यानी नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला. एका ओळखीच्या डाॅक्टरांच्या हाॅस्पिटलमधे त्यांना नोकरीही मिळाली. दोन्ही मुलांचं सगळं व्यवस्थित करता यावं म्हणून त्यांनी कायमची ‘नाईट ड्युटी’च घेतलेली होती. मुलांची रात्रीची जेवणं आवरुन त्या ड्युटीवर जायच्या. पहाटे परत यायच्या.  दिवस मुलांसाठी मोकळा ठेवायच्या. मुलं शाळेत गेली की दुपारी थोडा आराम. मग घरची सगळी कामं. मुलीनं समजुतीनं घेतलं. पण मुलाची आदळआपट हट्ट दिवसेंदिवस वाढत चालला. तो असा बिथरत का चाललाय याना समजेचना. त्या रात्री तर कहरच.

“तू आजपास्नं नाईट ड्युटीवर जायचं नाही बघ. ”

“का?”

“रात्रीच कशाला हवी ड्युटी? तू  दिवसाची ड्युटी घे बघ. ”

“वेडा आहेस का तू? मग घरची कामं कुणी करायची? आणणंसवरणं, स्वैपाक, धुणीभांडी कमी कामं असतात का?”

“मुलं शाळेत चिडवतात गं मला. त्या डाॅक्टरांचं नाव घेऊन चिडवतात. मला आवडत नाही ते” ऐकलं आणि त्या संतापल्याच.

“मला नावं सांग त्यांची.  उद्याच शाळेत येते तुझ्या. आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईबाबांनाही भेटते. गुडघ्याएवढी पोरं तुम्ही,अकला आहेत का तुम्हाला?”

मुलगा न जेवता घुसमटत रडत राहीला. त्याच मन:स्थितीत त्या रात्री ड्युटीवर गेल्या. सकाळी घरी आलो की त्याला जवळ घेऊन शांतपणे समजवायला हवं हा सुज्ञ विचार मनात डोकावून गेलाच. पहाटे घरी आल्या तर दार लोटलेलेच होतं. तेही किलकिलं.  दार ढकलून आत आल्या न् पाहिलं तर मुलगी एकटीच झोपलेली. मुलाचं पांघरुण तिथं तसंच विस्कटलेलं. मुलगा नव्हताच. खूप शोधाशोध,पोलीस कम्प्लेंट,पेपरमधे जाहिराती सगळं झालं पण मुलगा सापडला नाहीच.

काळजाला चरे पाडणारं हे दु:ख तसंच मनाच्या तळाशी दडपून ठेऊन काकू दिवस ढकलत राहिल्या. कांहीतरी चमत्कार घडेल आणि मुलगा दत्त म्हणून समोर येऊन उभा राहिल या एकाच आशेवर त्या इतकी वर्षं दिवस ढकलत राहिल्या. यावेळी त्या नागपूरला नेहमीप्रमाणे भावाकडे गेल्या तेव्हा तिथल्या कुणी ओळखीच्या एकानं त्याना सांगितलं होतं. . ,’आम्ही चारधामला गेलो होतो नुकतेच.  तेव्हा तुमच्या मुलाला आम्ही पाहीलं होतं. साधूवेशात होता.  तरीही ओळख पटली होती.  अंदाज घेत आम्ही त्याला नावाने हांक मारली तेव्हा त्याने दचकून मागे वळूनही पाहिलं होतं आणि मान फिरवून तरातरा निघून गेला. गर्दीत दिसेनासा झाला. ”

नेमका कुठे दिसला, भेटला काकूनी त्याना विचारुन घेतलं होतं. त्या तातडीनं चारधाम यात्रेला गेल्या होत्या ते मुलगा भेटेल या आशेने. एक नवी आशा मनात पालवली आणि क्षणात कोमेजूनही गेली. मुलगा भेटलाच नाही. कसं नशीब म्हणायचं हे ?मला हे समजलंच नसतं तर बदलीनंतर काकूंचा निरोप घेऊन निघताना माझा पाय अडखळला नसता.

आज बापट काकू हयात नाहीयेत. पूर्वी कारणपरत्त्वे कितीही धावपळीत मुंबईला जाणं होई तेव्हा त्याना आवर्जून भेटून तरी येत होतो. त्याना जाऊनही तीस वर्षं उलटून गेलीयत. पण त्यांच्या या सगळ्या दुखर्या आठवणी मात्र कालपरवाच सगळं घडून गेलं असावं इतक्या ताज्या आहेत. मला हवं ते भरभरुन द्यायलाच आल्यासारख्या त्या माझ्या आयुष्यात आल्या होत्या. मला असं उपकृत करुन ठेऊन गेलेल्या त्यांची कधीतरी अचानक आठवण येते आणि मला जेवतानाचा तो प्रसंग आठवतो.

“तू आल्यापासून मला दोन घास जास्त जायला लागलेत” एकदा त्या म्हणाल्या होत्या.

“सं का म्हणताय? उलट दोघांचा स्वैपाक करायचा तुमचा त्रास मी वाढवलाय” मी चेष्टेने म्हणालो होतो. ऐकलं आणि त्या गंभीरच झाल्या होत्या क्षणभर. का ते मला तेव्हा कुठं माहित होतं?

“त्रास कसला रे?कितीक वर्षात कुणासाठी तरी रांधायचं, त्याची जेवणासाठी वाट पहायची हे मी विसरुनच गेले होते. तू आलास तेव्हापासून हरवलेलं ते सगळं पुन्हा परत मिळाल्यासारखं वाटतंय”  त्या म्हणाल्या होत्या. . . .  त्यांच्या तेव्हाच्या त्या बोलण्याचा खरा अर्थ मला त्या चारधाम यात्रेहून परत आल्या त्यानंतर समजला होता. पुढे सगळं निसटूनच गेलं. त्यांच्या हातून आणि माझ्याही. इतकी वर्ष मनात जपून ठेवलेल्या त्याच्या या आठवणी त्यांच्या नसण्यामुळे अधिकच केविलवाण्या वाटतायत मला….

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जीवन गाणे -4 ☆ सौ. अंजली गोखले

☆ मनमंजुषेतून ☆  जीवन गाणे -4 ☆ सौ. अंजली गोखले ☆

किशोर वयातले ते अल्लड, अबोध कळी पण हळूहळू उमलत जाते, तस तसे अवतीभोवतीचे खरे वास्तव लख्ख दिसायला लागते ,  जाणवायला लागते. तारुण्याच्या उंबरठ्यावर डोळ्यांची पाखरं फडफडायला लागतात,  मनाला फुलपाखरी पंख फुटतात. स्वप्नांच्या ढगांमध्ये मुक्तपणे संचार सुरू होतो. एवढ्याश्या मनामध्ये, इवल्याशा नजरेची स्वप्न असंख्य असतात, , अभ्यासाची असतात करियरची असतात, मोठेपणी आई-वडिलांना आधार देण्याची असतात, मित्र-मैत्रिणींची असतात, आयुष्याच्या जोडीदाराची असतात, मोठ्या पगाराची नोकरी मिळवण्याची असतात.कोणाला मिलिटरी मध्ये जायचे असते, कोणाला क्रिकेटर बनायचे असते, कोणाला शास्त्रज्ञ तर कोणाला सर्जन!उन्हाळ्यामध्ये बहावा कसा फुलून, पिवळ्या जर्द नाजूक फुलांनी डवरलेला असतो, डोलत असतो, गुलमोहर गडद लाल फुलांनी आकर्षून घेत असतो, तसे तारुण्यातल्या मनाला ही सगळी स्वप्न खुणावत असतात.ती स्वप्न गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू असते.ज्यांना मनासारखे यश मिळते, ते सुखाने मनोराज्यात मुक्तपणे विहार करतात.ज्यांचे निम्मी किंवा अखे तरूणपण त्यांना पकडण्यात जाते, त्यांच्या मनाला ओरखडे पडतात, त्यांच्या स्वप्नांचे पक्षी दूर दूर भरकटत निघून जातात आणि उरते एकाकीपण!सभोवताली निराशेचे ढग जमायला लागतात.जीवनाला सुरवंटाचे काटे टोचायला लागतात आणि अपयशाने खचून जायला होते.यास  सुरवंटी अवस्थेमध्ये , एखादा जरी सोबतीचा हात मिळाला, सहानुभूतीची हलकीशी थाप पाठीवर पडली, तरी ते आयुष्य सावरायला मदत मिळते आणि बघता बघता आयुष्याची पन्नास-पंचावन्न वर्षे भुरकन सरतात.इतरांसाठी करता-करता, स्वतःच्या इच्छा , अपेक्षा, आवड गुंडाळून ठेवलेली असते.आयुष्याची संध्याकाळ खुणावायला लागते.

नेमक्या याच वळणावर आपल्या आयुष्याची, आरोग्याची, आपल्या माणसांची खरी किंमत कळते.काहींना”संध्याछाया भिवविती हृदया”हे जाणवायला लागते तर अनेकांना अनेक व्याधींचा  विळखा पडलेला असतो. त्यांना दवाखान्याचे खेटे घालावे लागतात, वेळच्यावेळी औषध पाण्याच्या वेळा सांभाळण्यात सहकार्याची दमछाक होते.आपल्या गाडीचा वेग मंदावलाय हे समजते. काहीजण मात्र यासाठी नंतर अतिउत्साही बनतात. आपले छंद जोपासतात. आपला आनंद आपणच शोधतात. पर्यटनाचा आनंद उपभोगतात. मित्रमंडळीत रमतात. वाचन मनन चिंतन आणि चर्चा अशा मधून एकमेकांशी संवाद साधतात. तरुणपणी जे करायला मिळाले नाही, जे छंद जोपासायला मिळाले नाही त, आयुष्यातले जे क्षण वाळूसारखे हातातून गेलेले असतात, ते पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करतात आणि जीवनाची संध्याकाळ मनासार खी उपभोगतात.

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जीवन गाणे -2 ☆ सौ. अंजली गोखले

☆ मनमंजुषेतून ☆  जीवन गाणे -2 ☆ सौ. अंजली गोखले ☆

आपल्यालासुद्धा आनंद देणारा.  उत्साह वर्धक असाच तो कार्यक्रम आहे असे मला वाटले.पण आपल्याकडे त्यापेक्षा विरुद्ध परिस्थिती आहे असे मला जाणवले.आत्ता या घडीला साठे च्या पुढचे.  पंच्याहत्तरी पर्यंतच्या लोकांनाहे म्हणणे पटेल.हे लोक तरुण असताना.  तरुणां सारखे वागायला मिळाले का त्यांना?सतत वयाने मोठ्यांचा मान राखायचा.  त्यांचे सांगणे ऐकायचे आणि त्याच प्रमाणे वागायचे.अश्या जबरदस्त पगड्याखाली.  रहावे लागल्या कारणाने.  सतत एक प्रकारचा दबाव त्यांच्यावर होता.त्यामुळे मनमुराद हसणे.  गप्पा मारणे.  सहकाऱ्यांबरोबर फिरणे अशा साध्या साध्या आनंदापासून ही मंडळी वंचित राहिली.घरचे काय म्हणतील?त्यांना आवडणार नाही.  त्यांनी एकदा नको म्हटले ना.  मग नको.अशा दबावाखाली त्यां चं तरुण पण संपलं .

विशेष करून महिलावर्ग या बाबतीत जास्तच दबला गेला .एखादी डिग्री मिळाली की त्यांचे पंख छाटले जायचे .संशोधन सुरू .मग इतरांच्या म्हणण्याला होकार देऊन.  माहेरचा मोकळा.  आनंदी स्वच्छंदी उंबरा ओलांडून.  टिपिकल वर्चस्वाचा दुसरा उंबरा ओलांडून. दुसऱ्या घरी जायचे. तिकडे गेल्यावर आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवायच्या.  स्वभाव बदलायचा.  पदरी पडले पवित्र झाले.  या नात्याने नवीन पण रटाळ आयुष्याला मन मारून सुरुवात करायची.खुर्चीत एखादी चे मत विचारले जायचे.  पण ते म्हणणेविचारात घेतले जाईल असे नाही .मग अशा सगळ्या वातावरणात तरुणपणीच.  मनाचे वृद्धत्व जाणवायला लागायचे.उडणाऱ्या पक्षाला पिंजऱ्यात कोंड्यावर तो लवकर म्हातारा होणारच ना!मग किती का गोड-धोड.  चांगले चांगले खायला घाला.  मानसिक वृद्धत्व आले किती घालवणे अवघड.

कोणालाही त्या त्या वयामध्ये.  जे येते.  जे करायला आवडते.  रुचते.  ते थोड्या प्रमाणात का होईना.  पण करायला मिळाले पाहिजे.सचिन तेंडुलकरच्या हातातून पंधराव्या वर्षी बॅट काढून घेतली असती.  तर त्याचे खेळणे फुलले असते का?त्याने इतके उत्तुंग ध्येय गाठले असते का?लता मंगेशकर ना मधुर गळ्यातून गायची संधी न देता.  दोन वेळेच्या भाकऱ्या बडवायला लावल्या असत्या.  तर आपल्याला अविट गाणी ऐकायला मिळा लीअस ती का?

आवडीचे काम करायला मिळाल्यावर शरीर हे सुदृढ राहते.  मन प्रसन्न राहते.  काम करायला उत्साह येतो आणि आनंदी आनंद उपभोगायला मिळतो.अशी व्यक्ती स्वतःही आनंदी राहते आणि दुसऱ्यालाही आनंद वाटते.असे हे सरळ वागणे .   फार थोड्यांच्या वाट्याला येते .बहुतेकांच्या बाबतीमध्ये सुरवंटाचे फुलपाखरू होण्याऐवजी फुलपाखराचे सुरवंट होते .

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गरज आहे.  ती सुरवंटाचे फुलपाखरू होऊ द्यायची.फुलपाखराचे गुन्हा सुरवंट न होऊ देण्याची.बाल्यावस्थेपासून वृद्ध अवस्थेपर्यंत प्रत्येकाला या संक्रमण आम मधून जावेच लागते.गरज आहे ती सावरण्याची !अशा कठीण प्रसंगी आपले मनोबल ढळू न देण्याची .कुणीतरी येईल आपल्याला मदत करेल.  या आशेवर न राहण्याची. विं.दा. नीसांगितल्याप्रमाणे “माझ्या मना बन दगड”ही अवस्था अनुभवण्याची.प्रसंगी मन कणखर बनवले.  तरच त्या व संतुलित अवस्थेत मधून संतुलन मिळू शकतो.

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मोरपंखी आठवण ☆ श्रीमती सुधा भोगले

☆ मनमंजुषेतून ☆ मोरपंखी आठवण ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

घराच्या पल्याड, उसाच्या शेतात, बरीच वर्षे मोर वस्ती करून होते. सकाळी ते मधली भिंत ओलांडून, नारळाच्या बागेत आपल्या कुटुंबकबिल्यासह चारा टिपायला येत. तीनचार लांडोर आणि मोर मात्र एकटाच बापडा! लांडोर,  मोराच्या मागे मागे जात. बराच वेळ त्यांचा मुक्तपणे संचार चाले.

साखर झोपेतून जाग येई ती त्यांच्या केकानीच!पुन्हा:निद्राधीन होताहोता उजाडेच. रोज त्यांच्या हालचाली पाहता पाहता, मनात येई, एकदातरी,  पिसारा फुलवून तुझे ते मोरपंखी सौंदर्य मला दाखवशील का? आणि तो क्षण एकदा येऊन ठाकला. शेजारच्या अपर्णाने दूरध्वनीवर सांगितले,  “अग सुधा, लवकर बाहेर ये!” . मोराने पिसारा फुलवला आहे, आणि मग मागीलदारी जाण्याची धांदल उडाली.  मोरपंखी रंगाचा विलोभनीय सोहळा अनिमिष नेत्रांनी पाहता पाहता मनाला रंगसुख देत होता.  तो पिसारा पाहता मनात आलं, उगाच नाही त्या मोरपंखी पिसाने, श्रीकृष्णाच्या मुकुटावर आढळस्थान मिळवलयं. त्या पिसाऱ्याचा मनोहारी रंग मनाला आनंद देतो. मन जेव्हां आनंदाने फुलून येते, तेंव्हा म्हटले जाते,  “बाई,  बाई,  मनमोराचा कसा पिसारा फुलला,  फुलला!”. काही आठवणी हळूवार मनात डोकावतात, आणि मग त्या अंगावर मोरपीस फिरवल्या सारख्या सुखद वाटतात.

लहानपणी,  त्या मोरपंखी रंगाचा ठेवा, पुस्तकाच्या पानात जपून ठेवताना रंगांची ऊब देते. एखादा फकीर आपल्या हातातील मोरपिसांच्या झुपकेदार पंखा धुपाटण्यावर  फिरवून ऐख्याद्याच्या डोक्यावर हळूवार फिरवत दुवा देतो. आशा असंख्य प्रसंगात, हे मोरपीस आपल्या रंगानी आणि विलोभनीय रूपाने दिमाखात मिरवीत असते. अशा ह्या बहुरंगी पक्ष्याची आपल्या देशाचा पक्षी म्हणून निवड झाली.

एकेदिवशी नारळाच्या बागेत येणारा मोर संध्याकाळच्या वेळेस चक्क नारळाच्या शेंड्यावर जाऊन बसला. ते पाहून मन चिंतेत पडले. अरे बापरे!आता याला खाली कसे आणायचे.  मोर खरंतर पाच फुटाच्यावर उडणारा पक्षी नव्हे. प्राणीमित्राना आता बोलवायला हवे. असे म्हणत सकाळ झाली. मागे उगाचचं मोराच्या काळजीने डोकावले तर हा त्या झाडाच्या शेंड्यावरून गायब!

रोज संध्याकाळी मागे नारळाच्या बागेत डोकावून, निरीक्षणाचा छंदच जडला.  एकेदिवशी, या मोराचे झाडावर चढणे, मी चोराला पकडल्यागत, पाहिलेच,  हा पठ्या आधी भिंतीवर मग भिंतीवरून लहान नारळाची झावळी, त्यावरून वरची,  त्यापुढची

असं करत वरचढून शेंड्याला जात असे, आपले शयनकक्षच  नारळाच्या झाडावर करू लागला. त्याच्यामागे लांडोर असत,  पण त्या कधी झाडावर चढत नसत. असे

कित्येक दिवस तो मोर झाडाचा व आमचाही  सोबती झाला.  केका  हा जीवनाचा रोजचा भाग झाल्या. मनाला सुखवणारे मोराचे हे रंगीत सुख नंतर, २००५च्या पुरात

वाहूनच गेले.  ऊसाची शेतं उजाड झाली. मोरांना बसायला,  आपला कुटुंबकबिला जपायला जागाच गेली. मोराने दुसरी सुरक्षित शेत पाहिले असावे. मोराच्या विरहाने मनाचा विरंगुळा हरवला. नारळाची बाग सुनीसुनी झाली. मनात त्या रंगसोहळ्याची

सुखद स्मृती जपत राहिलो.

 

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जीवन गाणे -1 ☆ सौ. अंजली गोखले

☆ मनमंजुषेतून ☆  जीवन गाणे -1☆ सौ. अंजली गोखले ☆

B.B C. वर नुकताच एक चांगला कार्यक्रम पहायला मिळाला. परदेशातील लोकांनी बनवलेला. विचार, प्रयोग, निरीक्षण, परिक्षण ‘ अनुमान निकाल या सगळ्या टप्यांवर आधारीत प्रयोगशील कार्यक्रम होता. प्रश्न निवडला होता तो जगातील सर्व स्त्री – पुरुषांसाठी चा

सर्वसामान्य पणे संपूर्ण जगामध्ये ६० वर्षे वयावरील सर्वाना सिनियर सिटिझन – अर्थात वृद्ध म्हणून संबोधले जाते. त्यांनी साठ वर्षे किंवा त्याहूनही कमी वयाचे स्त्री पुरुष निवडले होते. त्यांचे खरे वय नोंद केले गेले. त्यानंतर त्यांची उंची वजन ‘ काम करण्याची क्षमता, काय – किती खातात ‘ हे सगळे नोंद केले आणि एका मशिन व्दारे त्यांची स्थूलता ‘ त्यांच्या – मध्ये असलेले कोलेस्टिरॉल ‘ ते करत असलेले काम, व्यायाम या व्दारा त्यांच्या शरीराचे वय काढले. रिझर्टस् अचंबित करणारे होते.

एक ४९ वयाचा निवृत्त पोलीस अधिकारी होता. तो भरपूर जाड होता. नऊ महिन्याच्या गरोदर बाईचे पोट कसे वाढलेले दिसते ‘ तसे त्याचे सर्वसाधारण पोट होते. त्याच्या सगळ्या नोंदी केल्या गेल्या. मशिनव्दारे त्याचे वय काढले गेले. ४९ वयाच्या माणसाच्या शरीराचे वय किती यावे? तब्बल ९० वर्षे! तोही चमकलाच. त्याचा चेहरा इतका पडला की काही विचार नका. पण प्रयोग करणाऱ्या मंडळीनी त्याला दिलासा दिला. त्याला त्याचा व्यायाम खाणे पिणे, फिरणे, काम करण्याची पद्धत सगळे आखून दिले. तो खुर्चिमध्ये तासन्तास बसून कॉम्प्युटरवर काय करत होता. काय करणे तर त्याला सोडून चालणार नव्हते. त्यांनी त्याला उभे राहून कॉम्प्युटर उंच ठेऊन का म करण्याचा सल्ला दिला. त्याने तो मानला त्याचे खाणे किती काय खायचे ते ठरवून दिले. आणिसहा आठवड्यांनी पुनः परत बोलावले. त्यानेही मनापासून ते सगळे पाळले आणि ६ आठवड्यानंतर त्याच्या वजनामध्ये पोटाच्या घेरामध्ये ‘ त्याच्या कार्यक्षमते मध्ये लक्षणीय फरक दिसून आला. त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले. त्याच्या शरीराचे वजन ९० वरून ७२ पर्यंत कमी आले होते. आता त्याला त्यांचे सांगणे जास्तच पटले आणि वय आणखी कमी करण्याचा निर्धार त्याने केला.

एका प्रौद बाईवरही असाच प्रयोग केलेला दाखवला. ती फार जाड नव्हती, का मं करत होती कार्यरत होती. तरी तिच्या नैसर्गिक वयापेक्षा मशिनव्दारे शारीरिक वय जास्त आले. निरीक्षणामध्ये चेहऱ्यावर जास्त सुरकुत्या आल्या होत्या. तिलाही त्यांनी योग्य तो व्यायाम. योग्य खाणे ठरवून दिले. ६ आठवड्यानंतर तिच्याही चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी झालेल्या आढळून आल्या. काम करण्यामध्ये तिचा उत्साह वाढला होता. शारीरिक वय कमी झाल्याची नोंद झाल्यावर तिचा आनंद गगनात मावेना. ती खूप खुष होऊन गेली.

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 2 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे –2 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

मी अजून लढते आहे

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

माझ्या आई-बाबांना माझ्यावर आलेल्या संकटाची,उद्भवणाऱ्या अडचणींची पूर्ण कल्पना आली होती. माझ्यासमोर त्याबद्दल काहीही बोलले जात नसे. इतर भावं डाप्रमाणेच मलाही वागवले जात होते .

शाळेमध्ये सुद्धा माझ्या वागण्यावर खूपच मर्यादा येत होत्या. कितीतरी उणीवा,अर्थात उणीवा असे मी आता म्हणू शकते, त्यावेळी इतके समजत नव्हते. त्या उणिवा म्हणजे लिहिणं नाही. मैत्रिणींचे चेहरे दिसत नव्हते, समोरच्या बाई दिसत नव्हत्या. ग्राउंड वर पळवणे नाही, लंगडी पळती खेळणे नाही. नवीन वस्तू समजत नव्हती. रंग डिझाईन काहीच दिसत नव्हते. अशा कितीतरी मर्यादा होत्या, तरी बाबांनी माझं डोकं वक्तृत्वा मध्ये घातल्यामुळे शाळेमध्ये भाषण करण्याचा मी सपाटाच लावला होत. कितीतरी स्पर्धांमध्ये भाग घेत होते. बरेचदा बक्षीसही मिळे, पण नाही मिळाले तरी वाईट वाटून घ्यायचे नाही, रडायचे तर नाहीच नाही असे मला बाबांनी बजावून ठेवले होते. थोडक्यात काय माझ्या व्यक्तीमत्वा मधली रिकामी जागा वक्तृत्वाने भरून काढली. अजूनही मला नवीन नवीन ऐकण्याचा,ऐकलेले लक्षात ठेवण्याचा आणि लोकांसमोर मांडण्याचा अतिशय उत्साह आहे च.

साधारण मी तिसरी-चौथीत असताना माझ्या बाबांना प्रोजेक्टर आणि स्लाईड्स बक्षीस मिळाल्या होत्या. त्यावेळी मला पुसट पुसट दिसत होते. म्हणजे पडद्यावरची आकृती थोडे थोडे रंग जे माझ्या मनावर चांगले बिंबवले गेले. त्या स्‍लाईड्समध्‍ये भारतातील निरनिराळ्या नृत्य प्रकार यांची माहिती होती. त्यातील नृत्यांगना, त्यांचे छान छान ड्रेस, मस्त मस्त दागिने, आलता लावलेले लाल हात हे सगळे माझ्या डोळ्यासमोर आणि मनासमोर चांगलेच उमटले होते. ते नाच बघू न मी घरी गाण्यांवर आपली आपणच नाच करत होते .माझा मी आनंद मिळवत होते. साधारण सहावी मध्ये मला मिरजेतील विद्या गद्रे यांची मुलगी प्रतिमाही भेटली. ती मला गाण्यावर नाच शिकवू लागली. म्हणजे आता माझा अभ्यास, वक्तृत्व आणि नृत्य जोमात सुरू झाले. प्रतिमाने माझ्याकडून कटपुतली चा नाच बसवून घेतला होता. तो मला शाळेच्या स्टेजवर करायला मिळाला. सगळ्यांना खूप आवडला .भरपूर टाळ्या मिळाल्या. पण त्यावेळी मी माझ्या बाबांवर खूप रुसले होते, थोडीशी रागावले होते म्हणा ना! कारण नाचाच्या अधिक त्यांनी माझी ओळख अंध शिल्पा अशी करून दिली होती. जे मला अजिबात आवडले नव्हते. मी बाबांशी दोन दिवस अबोला धरला होता. त्यांना ते नंतर समजले .
विशेष म्हणजे मला कशाची पण भीती वाटत नव्हती. घरी बहिणी जसे करतात तसे करायचे असे मी थांब ठरवून ठेवले होते. एखादी गोष्ट आपल्याला करता येत नाही म्हणजे काय?आलेच पाहिजे असाच माझा हट्ट असे. एकदा मी देवासमोर दिवा म्हणजे समयी लावली होती, सगळं हाताने चाचपून. घरी काकांनी ते पाहिलं होतं. घरी मॅगी करून बघण्याची मला हौस. एकदा आई स्वयंपाक घरात नसताना मी एका भांड्यात पाणी घेऊन गॅसवर उकळायला ठेवलं, मॅगीचा पुडाही काढला. तेवढ्यात आई आली आणि मला धपाटा खावा लागला.

माझ्या सगळ्या वस्तू,पुस्तके,कंपास जिथल्या तिथे जागेवर असायच्या.माझ्या भावाला किंवा बहिणीला ते माहिती होतं,त्यांचं सापडेना झालं की गुपचुप माझा कंपास ते घेऊन जायच,माझ्या लक्षात आल्यावर मात्र मी रागवायची.अर्थात हे सगळं लुटूपुटूच्या असायचं.

सांगलीच्या गांधी वाचनालयातील वक्तृत्व स्पर्धा मला अजून आठवतात . पाचवी ते दहावी दरवर्षी मी भाग घेत होते. जवळजवळ पन्नास ते सत्तर मुलं-मुली सायची. दहावीपर्यंत मला नंबर मिळाला नाही. मात्र दहावीला माझं भाषण इतकं सुंदर झालं की त्यांना मला पहिला नंबर द्यावाच लागला.

शाळेपासूनच मला रायटर घेऊन परीक्षा देण्याची सवय लागली होती. दहावी मध्ये वनिता वडेर माझी मैत्रीण होती. अभ्यासामध्ये तिनं मला खूपच मदत केली .सगळं वाचून दाखवाय ची .मी ते लक्षात ठेवायची .दहावीत मला 80 टक्के मार्क्स मिळाले .वनिताला गणितात तेवढे माझ्यापेक्षा सात मार्क्स जास्त होते.

अकरावीमध्ये मी कन्या महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतली. अर्थातच माझ्यासाठी आर्ट्स साईडच बरोबर होती. इथेही मी खूप स्पर्धेमध्ये भाग घेतला .तिथल्या सगळ्या प्राध्यापकांची मी लाडकी होते .सगळ्या मैत्रिणी मला खूप खूप मदत करायच्या .कॉलेजला जाताना एकदा पाऊस सुरू झाला .तर एका मुसलमान मैत्रिणीं ने तिची ओढणी काढू न दिली.

तेव्हापासून माझ्या लक्षात आलं की आपण गोड बोललो,की समाजातील सगळ्याच आपल्याला मदत करतात .मलाही आईच्या कामामध्ये मदत करायची खूप इच्छा असायची. भाजी निवडणे, शेंगा सोलणे अशी मदत मी करत होते. माझे असे सहज वागणे बघून शेजार पाजाऱ्यांचा दृष्टिकोन बदलला. मला काम करताना बघून त्यांनाही आश्चर्य वाटे. आपण स्वतः मध्ये मॅग्नेटिक पॉवर निर्माण केली पाहिजे हे मी ठरवलं होतं.

कॉलेजमध्ये मी जे ऐकत होते,ते मनामध्ये टिपून ठेवत  होते. सगळे पीरियड्स अटेंड करत होते. त्यामुळे प्राध्यापकही माझ्यावर लक्ष ठेवून होते. माझे एकूण छान चालले होते.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print