मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सिनेमा जिंदाबाद ☆ सौ. सुनिता गद्रे

सौ. सुनिता गद्रे

? मनमंजुषेतून ?

 ☆ सिनेमा जिंदाबाद ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

“दादा घरी चला. हा मारुती सुद्धा हिंदीत का बोलतोय ?मला नको असला ‘पवनपुत्र हनुमान’. चला ना दादा.” असं किरकिरणं…. आणि मग नंतर जोर-जोरात रडणं… आणि लोकांचं “अहो काका, त्या पोराला बाहेर घेऊन जा .असं दटावणं…पडद्यावर पिक्चरचा सीन चालू… तर टॉकीजमधे लोकांचं ओरडणं.

“काय कार्टं आहे .मगाशी खुर्चीवर उभं राहून पडद्यावर पडणाऱ्या प्रकाशझोतात हात घालत होतं…आणि आता हे रडणं.” आजूबाजूचे प्रेक्षक जाम वैतागले होते.

शेवटी दादा-आमचे आजोबा माझ्या चुलत भावाला- सुहासला हाताला धरुन ओढत बाहेर घेऊन गेले. डोअरकिपरजवळ स्वतः बसले अन् तो शहाणा बाहेर खिशातनं गोट्या, भोवरा काढून खेळत बसला… मधनंमधनं, खिशात भरलेल्या टॉफ्या,चिरमुरे, फुटाणे, शेंगदाणे फस्त करत राहिला.

 मध्यंतर झालं. आम्ही बाहेर गेलो. आपल्या दोन्ही खिशात, टाइमपास म्हणून आणलेला दादांच्या पिशवीतला चिमणचारा (खादगीचा माल)भरला.. आणि आम्ही दंगा न करता शांतपणे सिनेमा बघू असं दादांना आश्वासन देत, जाता जाता न चुकता सुहासच्या डोक्यावर टपल्या मारत…त्याला रडवत पुन्हा आपल्या सीटवर येऊन बसलो.

ही कित्ती जुनी गोष्ट आहे, जवळजवळ साठ पासष्ठ वर्षापूर्वीची. तेव्हाचा सिनेमा नंतर पिक्चर आणि आता मूव्ही झालाय.

तर तेव्हाची ही कहाणी. आम्ही सांगलीच्या गावभागातील महाबळ वाड्यातील ,जॉइंट फॅमिलीत राहणारी , महाबळांच्या घरातली नवरत्नं …पुरे ,पक्के गावभागी सांगलीकर…. जणू सदाशिवपेठी पुणेकरांची धाकटी भावंडं…एवढी ओळख पुरेशी आहे…

आमच्या घरी आमचे सतरा जणांचे कुटुंब. आजी-आजोबा त्यांची तीन मुले, तीन सुना आणि नऊ नातवंडे. शिवाय पाहुणे- रावळे ,ठराविक वारी जेवायला येणारे माधुकरी- असे भरगच्च कुटुंब .श्राद्धपक्ष, सणवार, उत्सव, व्रतवैकल्ये, उपासतापास  यात पूर्णपणे गुरफटून गेलेला एक सुखी समाधानी परिवार.

आम्ही मुलं आजीपासून, तिच्या तापट स्वभावामुळेआणि तिच्या सोवळ्या-ओवळ्यामुळे जरा दूरच असायचो. फक्त जेवणाच्या वेळी आम्ही तिच्या दृष्टीला पडायचो. पण आजोबा- दादांजवळ आम्ही बिंदास….! आमचं घर तसं तेव्हाचं रसिकच म्हणायला पाहिजे. त्या काळात आमच्याकडे ग्रामोफोन होता. एक आजी सोडली तर… काका-काकू आई बाबा सगळ्यांनाच नाटक, सिनेमाची आवड. एक काका गायक (गवई). आजोबा पूर्वीच्या  बालगंधर्वांच्या नाटकाचे शौकीन ! त्यामुळे दादांबरोबर मधूनमधून सिनेमाला जाणं हा आम्हा मुलांसाठी आनंदाचा विषय असायचा .आम्हाला दाखवले जाणारे सिनेमे पण पौराणिक ऐतिहासिक असे असायचे. रामराज्य, संपूर्ण रामायण,  भूमिकन्या सीता, गजगौरी, मायाबाजार, पवनपुत्र हनुमान, सती अनुसूया, गुरुदक्षिणा, आणि असेच पौराणिक…. तर बाल- शिवाजी, राजा शिवछत्रपती, पावनखिंड, महाराणी येसूबाई, रामशास्त्री प्रभुणे, इत्यादी… ऐतिहासिक ! कथा साधारण माहिती असायची. त्यामुळे तर संवाद कळले काय किंवा नाही कळले काय,आणि सिनेमा हिंदीत असला काय ! काही फरक पडायचा नाही. 

पण जेव्हा दादा आम्हाला झनक झनक पायल बाजे, मदर इंडिया, बघायला घेऊन गेले होते, तेव्हा ते सिनेमे आम्हाला समजलेही नाहीत आणि आवडलेही नाहीत.तो नाचणारा माणूस तर अजिबातच आवडला नाही. मदर इंडियातले काही प्रसंग आवडले ,जे गमतीदार होते. इतरही प्रसंग बरेचसे कळले.पण संवादाच्या नावाने ठणठणाटच… आणि त्या रडक्या, धाकट्या सुहासला बरोबर घेऊन जायचे सोडल्यामुळे ‘चिमणचारा’ खात आमचा छान टाईम पास व्हायचा. मेच्या सुट्टीत आत्या आल्या की आणखी पाच जणं पाहुणे मेंबर….. प्रताप किंवा सरस्वती टाकिजला सिनेमा पाहिला की नंतर अमराई चक्कर, हा ठरलेला प्रोग्रॅम. किंवा रेल्वे स्टेशनवर गाडीचे इंजिन पूर्ण वळत असलेले दृश्य पाहून मगच घरी जायचे,हे ठरलेले.

आम्हाला सगळ्यात जास्त आवडलेला सिनेमा म्हणजे ‘जागृती.’ तो पाहिल्यावर बरेच दिवस आम्ही भारावून गेल्यासारखे जागृतीच्या चर्चेत रमून गेलो होतो. जागृतीनं आम्हाला हसवलं होतं आणि रडवलंही. दादांनी टॉकिजच्या बाहेर मिळणारी त्याच्या गाण्यांची तीन पुस्तके घेऊन दिली होती… आमच्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागून.!…ते पाठांतराची स्पर्धाही घेणार होते. म्हणून आम्ही त्यातली सगळी गाणी तोंडपाठ केली होती.आओ बच्चो तुम्हे दिखाऊ झाँकी हिंदुस्तान की…. दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल… हम लाए है तुफान से कश्ती निकालके..चलो चले माँ…अशी सगळीच. ही स्पर्धा काही झाली नाही. पण तेव्हा तोंडपाठ झालेली गाणी अजूनही लक्षात आहेत.

हळूहळू मोठी होणारी  भावंडं ग्रुपमधून बाहेर पडली आणि छोटी छोटी सामील झाली. आम्ही तीन-चार जण मधले, त्यामुळे कायमचे मेंबर.

मोठ्या झालेल्या एका जीनियस भावाने घरातले सामान वापरून एक प्रोजेक्टर तयार केला होता. भिंग एका लाकडी फळ्यांच्या साच्यात बसवून, मधे कोठेतरी फिल्मा ठेवून आणि मागून टॉर्चचा झोत सोडून ,तारेवर घातलेल्या पांढर्‍याशुभ्र धोतरावर फिल्मांची प्रतिमा म्हणजे आमचा सिनेमा दिसायचा. फिल्म बहुतेक उलट्या  ठेवाव्या लागायच्या… खाली डोकं वर पाय… आम्ही कायमचे मेंबर लोक आनंद, जयश्री टॉकीज आवारातील तुटलेल्या फिल्म गोळा करायचं काम करायचो. एक पहिली सर्टिफिकेटवाली फिल्म आणि एक दि एंडची फिल्म… मधे आलटून पालटून पंचवीस-तीस फिल्मांचा आमचा सिनेमा म्हणजे घरातल्या आणि शेजारपाजा-यांच्या कौतुकाचा विषय होता.

हिंदी सिनेमाची गाणी आम्ही आमचे जबरदस्त, भारी शब्द वापरून म्हणायचो. अर्थाशी याचा अर्थातच काही संबंध नसायचा. एकदा तर आमच्या एका चिमुरड्या भावानं माँटेसरीत ऍडमिशन झालेल्या दिवशी बाईंनी गाणं म्हणायला सांगितल्यावर जोरदार आवाजात ,’ हसता हुआ नूरानी चेहरा… म्हणतम्हणत शेवटी…. दिलरूबा,दिलरुबा  ऐवजी….जिंदाबाद, जिंदाबादचा हवेत हात उंचावून नारा देत सगळ्या वर्गाला पाच -सहा वेळा जिंदाबाद… जिंदाबाद म्हणायला आणि बाईंना कोपरापासून हात जोडून नमस्कार करायला भाग पाडलं होतं.

जेव्हा मी पाचवीत होते.. तेव्हा आमच्या वडिलांची सांगलीहून बदली झाली… आणि आम्ही बरेच मधले मेंबर दूर झालो….दादा पण थोडे थकले होते ,त्यामुळे आमची सिनेमाची ती गंमत संपुष्टातच आली .पण अजूनही राहिल्यात त्या त्याच्या मनाला गुदगुल्या करणाऱ्या गोड आठवणी—

© सौ सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सरदार पेठ – शिरूर घोडनदी ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? मनमंजुषेतून ?

☆ सरदार पेठ – शिरूर घोडनदी ☆

आम्ही पुणं सोडून शिरूर घोडनदी या तालुक्याच्या ठिकाणी नवीन बि-हाड केलं ! शिरूर मधे आमचे नातेवाईक- बाबासाहेब पवार रहात होते, खरं तर ते देवासचे सरदार पवार,आजोबांची बहिण (माँसाहेब) बाबासाहेब पवारांच्या वडिलांची सावत्र आई ! त्यांच्याच गावात पिंपरी दुमाला येथे आम्ही स्थायिक झालो होतो. त्यांनीच आम्हाला शिरूरला भाड्याचं घर बघून दिलं, ते जिथे रहात होते ते घर सोडून दुसरं घर !

पवारांचं घर मोठं आणि प्रशस्त होतं. दोन मजली स्वतंत्र वाडा, पवार काकींचं व्यक्तिमत्व सरंजामदारणीसारखंच रूबाबदार होतं !त्यांच्या घरातलं वातावरण आणि राहणीमान उच्चभ्रू होतं !

त्यांनी आम्हाला दाखवलेलं घर पलिकडच्या वाड्यात वरच्या मजल्यावर होतं. घर छान होतं.   आमचं ते घर सरदार पेठेत होतं, पण येण्याजाण्याचा रस्ता पाठीमागच्या बाजूने होता ते गैरसोयीचं वाटे. तिथे आम्ही चार पाच महिनेच राहिलो. त्या घराच्या समोरच एक दोन मजली घर होतं. त्या घराची मालकीण मुस्लिम होती, ती मुंबईला रहात होती….त्या घरात कोणीच रहात नसल्यामुळे त्या घराला “भूतबंगला” म्हणत. पण आईला ते घर आवडलं आणि आम्ही त्या चार खोल्यांच्या  प्रशस्त घरात रहायला गेलो. कुणीही शेजार पाजार नसलेला तो एक स्वतंत्र बंगलाच होता. पाठीमागे छोटंसं अंगणही होतं. आम्ही विद्याधाम प्रशाला या शाळेत जात होतो. मी सातवी अ मधे प्रवेश घेतला तेव्हा पहिल्याच दिवशी माझी राणी गायकवाड नावाच्या मुलीशी ओळख झाली. लता रजपूत, संजीवनी कळसकर, चित्रा कुलकर्णी,मंगल पंढरपूरे, सुनंदा बेलावडे, माधुरी तिळवणकर, पुढे आठवीत फैमिदा शेख, सरस बोरा, उज्वल, निर्मल या वर्गातल्या  मुली होत्या. ती शाळा मला खुप आवडली. मी पहिली कविता आठवीत असताना लिहिली- हस्तलिखित नियतकालिकासाठी !

माझी धाकटी बहीण खूप हुषार होती, तिने पहिला नंबर कधीच सोडला नाही. 

आम्ही तीन सख्खी, तीन चुलत भावंडे अशी सहा मुलं, आई आणि आमच्या गावाकडच्या एक काकी आईला सोबत म्हणून आलेल्या. त्या एकट्याच होत्या, पती लवकरच वारले, एकुलत्या एक मुलीचं लग्न झालं होतं, त्यामुळे बरीच वर्षे काकी आमच्याकडेच राहिल्या ! त्या पहाटे उठून बंब पेटवत आणि सगळ्यांच्या आंघोळी होईपर्यंत बंबावर लक्ष देत. त्यांनी आईला स्वयंपाकघरात कधीच मदत केली नाही. त्यांना स्वयंपाक येत नव्हता की करायला आवडत नव्हता माहीत नाही पण तशी ती खूप तडफदार बाई होती. पूर्वी त्या वडनेरहून पिंपरीला घोड्यावर बसून येत. आम्ही त्यांना वडनेरच्या काकी म्हणत असू. माझे आजोबाही जवळपासच्या गावात, शेतावर घोड्यावर बसूनच जात ! ह्या काकी म्हणजे आजोबांच्या चुलतभावाची सून !

आमच्या त्या “भूतबंगला” घरात आम्ही एक वर्ष राहिलो. मला ते घर खूपच आवडायचं. पण आमच्याकडे पहिलवान असलेला वडिलांचा मामेभाऊ आला होता. रात्री झोपेत तो खूप जोरात ओरडला.  आम्ही सगळे जागे झालो, “या घरात भुताटकी आहे, कुणीतरी अज्ञात शक्तिने माझा हात ओढला ” असं तो म्हणाला !

नंतर काही दिवसांनी आम्ही ते घर सोडलं आणि थोडं पुढे भूविकास बँकेशेजारी बरमेचा निवास मधे रहायला गेलो. हे ही घर बरंच मोठं होतं ! सरदार पेठेत तीन घरं बदलल्यानंतर वडिलांनी छत्रपती सोसायटीत बंगला बांधण्यासाठी प्लाॅट विकत घेतला !

शिरूरमध्ये वडिलांची पत प्रतिष्ठा होती. सगळे त्यांना बाजीरावशेठ म्हणत !तीन दुकानात आमची खाती होती आणि तिथून कुठलीही वस्तू आणायची आम्हाला मुभा होती.

शिरूर या शहराला माझ्या आयुष्यात खूप महत्वाचे स्थान आहे. माझी जडणघडण शिरूरमध्येच झाली, शिरूरमध्ये रेडिओ ऐकायचं वेड लागलं, वाचनाची आवड निर्माण झाली. खूप सिनेमा पाहिले. राणी गायकवाड ही खूप जिवाभावाची मैत्रीण मिळाली…. वडनेरच्या काकी, गावाकडून आणलेली कली ही कामवाली पोरगी, जना मोलकरीण या सा-यांना माझ्या आईनं मोठ्या हिकमतीनं सांभाळलं. आई नेहमी आजारी असायची पण रोजचा स्वयंपाक कधीच टाळला नाही, सुगरणच होती ! तिनं आम्हाला खूप आरामशीर सुखवस्तू आयुष्य जगू दिलं !

खंत एकच– शिरूरमधे मला काॅलेज अर्धवट सोडावं लागलं, तो जो “हादरा” मला बसला,, त्यामुळे मी खूप निराशावादी कविता केल्या. 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? मनमंजुषेतून ?

babasaheb purandare felicitation ceremony: बाबासाहेब पुरंदरेंचा उद्या नागरी सत्कार; निमंत्रितांच्या यादीत 'या' दिग्गजांचा समावेश - shiv shahir babasaheb purandare turns 100 ...

☆ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

गेल्या काही दिवसात  शिवशाहीरांवर  लिहिलेले कितीतरी लेख वाचले. त्यांच्या मृत्यूमुळे झालेली पोकळी कधीच भरून निघणारी नाही. आज साठी- सत्तरीला असणाऱ्या  प्रत्येकाने कधी ना कधी बाबासाहेबांची व्याख्याने ऐकली असतील ! तो धबधब्याच्या अखंड प्रवाहासारखा  वाणीचा अखंड स्त्रोत एकदा सुरू झाला की त्या प्रवाहाखाली सचैल स्नान करण्याचे भाग्य ज्यांना लाभले ते खरंच भाग्यवंत ! सुदैवाने हे भाग्य आम्हाला मिळाले ! आता पुष्कळांनी त्यांच्या आठवणी काढल्या असतील ! खूप छान लेखन वाचायलाही  मिळतंय, तरीही मला आठवणारे  ते रत्नागिरीतील शिवव्याख्यानाचे आठ दिवस व्यक्त करावेसे वाटत आहेत.

  साधारणपणे 66/ 67 सालची गोष्ट असेल. रत्नागिरीला महिला विद्यालयाच्या मैदानात बाबासाहेबांच्या व्याख्यानाचा महोत्सव होता. पूर्ण महोत्सवाचे तिकीट काढले होते. रोज रात्री ठराविक वेळेला (बहुतेक आठ किंवा साडेआठ, नक्की आठवत नाही) व्याख्यान सुरू होत असे.  वेळेच्या बाबतीत अतिशय कडक असलेले बाबासाहेब, व्याख्यानाची सुरुवात करण्याच्या वेळेनंतर पाच मिनिटातच गेट बंद करायला लावत असत. त्यानंतर कोणालाही आत प्रवेश नसे आणि बरोबर एक तासानंतर व्याख्यान संपत असे. तीही वेळ अगदी कटाक्षाने पाळली जाई. भारावलेल्या मनस्थितीत लोक बाहेर पडत असत. जणू काही शिवकालातच आपण सर्वजण वावरत असू ! लहान मुलांचे रडणे, ओरडणे त्यांना अजिबात चालत नसे. त्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी असा त्यांचा आग्रह असे. कारण अशा व्यत्ययामुळे रसभंग होत असे, तो त्यांना आवडत नसे. आम्ही जिवाचे कान करून त्यांचा प्रत्येक शब्द ऐकायचा प्रयत्न करत असू. काहीजण त्यांच्या व्याख्यानाचे टिपण काढत असत. त्यावेळी त्यांची सही घेण्यासाठी आम्ही धडपडलो होतो तेही आठवते ! त्यांची

पल्लेदार वाक्यं, खानदानी भाषा, डोळ्यासमोर मूर्तिमंत शिव- इतिहास निर्माण करण्याची क्षमता ! खरोखरच ते सर्व अद्भुत होते ! ‘ शिवरायांचा आठवावा प्रताप…’ सांगणारे रामदास स्वामी शिवाजी महाराजांच्या काळातच होते, त्यांनी शिवाजीमहाराज अनुभवले, पण बाबासाहेबांनी ते पुन्हा आपल्यासमोर सत्यात आणले !

  शाळेत असताना शिवरायांचा इतिहास इयत्ता चौथीच्या पाठ्यक्रमात आम्ही शिकलो. पुढे मोठे झाल्यावर बाबासाहेबांच्या ‘राजा शिव छत्रपती’ पुस्तकाचे भाग पारायणासारखे वाचून काढत होतो. कितीही वेळा वाचले तरी शिवचरित्र हे कायमच नवीन वाटते ! मुलांना शिकवतानाही शिवचरित्र ऐकवत होतो.

  बाबासाहेब पुरंदरे आणि लता मंगेशकर यांच्या संदर्भात एक गोष्ट आठवते ती म्हणजे,  लतादीदींच्या 90 व्या वाढदिवसाच्या वेळी बाबासाहेब म्हणाले होते की, ‘तुमचा शंभरीचा वाढदिवस करायला मी नक्की असेन !’ आता प्रत्यक्षात जरी ते नसले तरी त्यांचे अस्तित्व आपल्यासाठी कायमच राहणार आहे. शिवरायांचा आणि त्या काळाचा बाबासाहेबांना इतका ध्यास होता की ते खरोखरच त्या काळात जगत असत. त्यांच्या घरातील मंडळींना मानाने हाक मारली जात असे. तसेच मुजरा केला जाई असेही ऐकून होतो !

आज शंभराव्या वर्षी त्यांचे निधन झाले असले तरी बाबासाहेबांचा मृत्यू झालेलाच नाही– ते त्यांच्या विचारातून आणि ग्रंथातून अमर झालेले आहेत !

  बाबासाहेबांविषयी माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीने लिहिणे म्हणजे अवघडच आहे ! पण त्यांची भाषणे ऐकली होती त्यांचे स्मरण झाले. त्यामुळे त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त कराव्या असे वाटले म्हणून हा छोटासा लेख !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वैद्यो नारायणो ☆ डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ वैद्यो नारायणो ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

कुठेही असलो तरी आम्ही डॉक्टर, आमच्यातल्या  डॉक्टरला  मुळीच विसरत नाही. त्याच संदर्भातली माझी  एक आठवण—-

चार  वर्षांपूर्वी मुलीकडे अमेरिकेला गेले होते. तिकडून इकडे परत येताना स्वाभाविकच मन अगदी कासावीस आणि व्याकुळ होते. विमानतळावर पोचवायला लेक जावई आणि सगळ्यात लाडकी नात आली होती. “ आजी नको ना जाऊ.  मी पण येणार  इंडियाला “–असे म्हणत  माझा जीव आणखीच व्याकूळ करणारी माझी नात. 

जड अंतः करणाने त्यांचा निरोप घेऊन विमानात बसले,  पण मन मात्र अजून तिच्या घरातच होते. 

तीन महिने अनुभवलेली ती आद्याची गोड बडबड—आई डॅडी रागावतील म्हणून त्यांना न सांगता केलेले लाडिक हट्ट—सगळं सगळं बरोबर घेऊनच पाऊल विमानात ठेवले होते। विमान म्युनिकला पोचले आणि आता ४ तास तिथेच थांबायचे होते. मुंबईला जाणारे इतर बरेच लोक भेटले, आणि ४  तास कसे गेले समजलेच नाही.

मुंबईच्या विमानात बसलो आणि विमानाने आकाशात झेप घेतली. नेहमीच्या सवयीने मी पुस्तक काढून वाचायला लागले. जरा वेळाने माझ्या पुढच्या सीट वरून मला कोणीतरी रडत असल्यासारखा भास झाला. जरा वेळाने चक्क हुंदके ऐकायला आले. न राहवून मी डोकावून बघितले, तर तिथे बसलेल्या जवळपास ८०-८२ वर्षाच्या एक आजी रडत होत्या. मराठी दिसत होत्या.

मी विचारले, “ काय झाले आजी ? काही होतंय का तुम्हाला? “ 

तर म्हणाल्या, “ माझं भयंकर डोकं दुखतंय. काही सुचत नाहीये. “ 

मी हवाई सुंदरीला बोलावले. ती जवळ बसली.  विचारू लागली. पण आता आजी आणखीच रडायला लागल्या. ती बिचारी घाबरली आणि तिने सिनियरला बोलावले.

” मला आता हे सहन होत नाहीये. माझ्या छातीत पण दुखतंय.” आजी कळवळत म्हणाल्या

आता तर त्या एअर होस्टेस ही घाबरल्या. हे सगळे मी बघत होते

मी विचारलं, “ मी बघू का ? मी डॉक्टर आहे, आणि मदत करू शकते.” 

त्वरित आजीच्या शेजारचा प्रवासी उठला, आणि म्हणाला “ डॉक्टर प्लीज पुढे या.” 

मी त्याच्या सीटवर गेले. एअरहोस्टेस खूपच टेन्स झाल्या होत्या. मी आजीच्या जवळ बसले. 

म्हणाले, “  आजी घाबरू नका. मी आहे ना आता तुमच्याजवळ ? “

मी एअरहोस्टेसना म्हटलं, “ माझ्या कडे उत्तम पेन किलर गोळ्या आहेत, मी याना देऊ का– त्यांना लगेच बरे वाटेल.” 

“ द्या ना प्लीज।” त्या लगेच म्हणाल्या.

“ आजी तुम्हाला कसली allergy आहे का ?”

“ नाही “ 

“ सकाळपासून काय खाल्लंय तुम्ही ?”

“ काही नाही हो. मन नुसतं बेचैन झालंय। मला काही सुचले नाही खायलाही.” 

मी एअरहोस्टेसना  ज्यूस आणायला सांगितला. 

आजींना म्हटले, “ आजी ही गोळी घेऊन टाका.  मस्त बरे वाटेल बघा. अहो मलाही खूप वाईट वाटतंय– मुलीला आणि  नातीला सोडून येताना. पण काय करणार ? “ 

 आजी म्हणाल्या, “ ४ महिने होते हो  मुलाजवळ. आता या वयात असे मानसिक आघात

सहन नाही होत. मी पुन्हा नाही येणार आता कधी परदेशात.” 

मी गोड बोलून आजीना गोळी घ्यायला लावली. थोडा ज्यूस पाजला. आजींना झोप लागली. 

हे बघून मगच एअरहोस्टेस मला विचारून तिथून आपल्या  कामाला गेल्या.

आजी थोड्या वेळाने जाग्या झाल्या. माझा हात त्यांच्या हातातच होता.

मला म्हणाल्या, “ खूप कमी झाले हो माझे डोके.  अगदी बरे वाटतेय मला.” 

म्हटले, “ आजी तुम्हाला मानसिक त्रास झाला, बाकी काही नाही. मी विशेष काहीच नाही केले. “ 

मला म्हणाल्या, “ बाई ग देवासारखी आलीस हो मदतीला. काय सुंदर दिलेस बाई औषध. अग मी एकटीच असते मुंबईला. मुलगा नातू सून अमेरिकेत. माझे मिस्टर  मागच्या वर्षी  गेले, आता मी एकटीच रहाते फ्लॅटमध्ये. एकटीने प्रवास करायची ही माझी पहिलीच वेळ. म्हणून हे सगळे दडपण आले.” 

आजीचे डोळे पुन्हा भरून आले—-“ मुलगा म्हणतो आई एकटी नको राहू. इकडे कायमची ये. 

 मी ग्रीन कार्ड करतो. पण मला नाही आवडत तिकडे. तुझे आभार ग बाई. हे विमानातले खाणेही

मुळीच आवडत नाही मला.” आजी म्हणाल्या. 

मी माझ्या जवळचा शिरा आणि लाडू आजीना दिला. म्हटले “ बघा ,लेकीची माया. आईची काळजी किती. सकाळी शिरा आणि पुऱ्या करून दिल्या.” 

आजींनी आनंदाने सगळे खाल्ले. आता डोके छाती सगळे थांबले म्हणाल्या. पुन्हा त्यांना मस्त झोप लागली. एअरहोस्टेसनी माझे आभार मानले, आणि सुटकेचा निश्वास टाकला.

मुंबई आली– सगळे  सोपस्कार उरकून बाहेर आले तर आजी वाट बघत होत्या. त्यांची बहीण त्यांना न्यायला आली होती. माझी ओळख करून देत म्हणाल्या,“ ही मुलगी नसती तर माझे कठीण होते बाई. .मला कोणती गोळी दिलीस ती लिहून दे हो. “ 

मी हसले आणि म्हणाले, “ आजी, ती साधी पेन किलर होती. तुम्हाला फक्त धीर, प्रेम आणि आश्वासनाची गरज होती तेवढेच काम मी केले, बस.” मी आजींना नमस्कार केला.

त्या म्हणाल्या. “  देव कल्याण करो ग बाई तुझे. डॉक्टरला धन्वंतरी म्हणतात ते उगीच नाही. “ 

 त्यांनी मला हात जोडले–” अशीच पुण्यकर्म करत रहा ग बाई. अग देव काही  वेगळा असतो 

का ? तुझ्या रूपात भेटलाच की मला.” 

“ आजी एवढे नका मला मोठेपण देऊ हो. माझे कर्तव्य केले मी.” 

आजींनी मला जवळ घेतले, माझ्या डोक्यावरून हात फिरवला, आणि डोळे पुसत बहिणीबरोबर चालू लागल्या—

त्या थकलेल्या दोघी वृद्ध बहिणी बघून माझेही डोळे भरून आले ——

 

©  डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणी दाटतात— ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  मनमंजुषेतून ?

☆ आठवणी दाटतात ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

ऐकताच त्या काव्य ओळी—

आठवणी दाटतात—

माझे लग्न ठरले. त्यावेळी वडीलांनी आम्हाला सर्वांना ‘ या सुखांनो या’ हा सिनेमा दाखवला होता. आता केव्हाही  ‘या सुखानो या’ हे गाणे ऐकले की त्या मधुर आठवणी जाग्या होतात. एका निमित्ताने सीमाताई देवांशी बोलताना आम्ही या सिनेमाबद्दल, आठवणीबद्दल बोललोही आहोत.

माझ्या लग्नातली ही आठवण– लग्न अगदी थाटात लागले. ‘मिष्ठान्नम् इतरे जन:|’ या उक्तीप्रमाणे पंगतीवर पंगती उठत होत्या. लग्न मिरजेतील एका नामांकित कार्यालयात होते. त्याकाळी आजच्यासारखी सगळीकडे कार्यालयांची सोय नव्हती. त्यामुळे मिरजेतील कार्यालयांचा खूप नावलौकिक होता. माझे माहेर एक छोटेसे तालुक्याचे गाव होते. तिथल्या बऱ्याच जणांनी अशा कार्यालयातील लग्न पाहिलेलेच नव्हते‌. त्यामुळे बऱ्याच जणांना रंगीत पाटांची मांडणी, रांगोळ्या, उदबत्या, आग्रहाने वाढलेली पंगत या गोष्टींची खूपच अपूर्वाई वाटली.

ह्या पंगती सुरू असतानाच सर्व लग्न विधी पार पडले. आता दोन्हीकडची मानाची माणसे जेवायला बसणार होती. त्यामुळे या खाशा पंगतीसाठी गरम गरम भजी, पुऱ्या,  मसालेभात वगैरे खास व्यवस्था केली होती. रांगोळ्या, समया, उदबत्या, चांदीचे ताट- वाटी, असा थाट होता. आम्ही दोघे मध्ये आणि आजूबाजूला सर्व नातेवाईक असे जेवायला बसलो. उखाणे घेत आम्ही एकमेकांना घास दिले. हसत खेळत पंगत सुरू झाली

ह्यांच्या मामींनी  ‘ लक्ष्मी तू या नव्या घराची झालीस गं लाडके ‘ हे गाणे खूप छान म्हटले. ऐकून जरा धीर आला‌. तोपर्यंत एक जणीने ‘ गंगा यमुना डोळ्यात उभ्या का ‘ हे गाणे सुरू केले आणि सगळे वातावरणच बदलून गेले.

माझे वडील आधीच खूप संवेदनशील होते. त्यातच आजी गेल्यापासून जास्तच हळवे झालेले होते. या गाण्यामुळे त्यांचे डोळे भरून आले. मी १- २ वर्षांची लहान असताना आई-वडील मला लाडाने बाळे म्हणत असत. ‘कडकडूनी तू मिठी मारता बाळे’  ही ओळ ऐकली आणि माझ्या वडिलांच्या डोळ्यातून धारा सुरू झाल्या. त्यांचे पाहून बहुतेकांचे डोळे पाणावले. एक दोघींनी तर हुंदके दिले. पाहता पाहता पंगतीचा सगळा नूरच पालटला. रंगाचा पुरता बेरंग झाला होता. पक्वान्नांची तर चवच गेली होती.

माझी अवस्था फारच केविलवाणी झाली होती. शेजारी नवरदेव आणि सासरची मंडळी. सर्वांच्या नजरा आमच्यावर खिळलेल्या. त्यामुळे तोंडावर उसने हसू आणत कसेबसे जेवण पार पाडले. दुपारचा हा प्रसंग अनुभवल्याने संध्याकाळी सासरी जायला निघताना रडू आवरण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला. त्याचे माझ्या मनावर इतके दडपण आले की नंतर दोन-तीन दिवस चक्क दुखणे आले.

काही काही माणसांना काळ-वेळाचे भानच नसते. आपल्या कृतीने इतरांच्या आनंदावर विरजण पडते, याचे त्यांना काहीही देणे घेणे नसते. आमच्या लग्नाची ही पंगत माझ्या मनात कायमची घर करून बसली आहे. लग्नातल्या इतर सर्व आनंददायी गोष्टींवर तिने जरा जास्तच मात केलेली आहे. प्रत्येक गाण्याला गीतकार, संगीतकार, गायक यांच्या दृष्टीने एक विशिष्ट असा इतिहास असतो. या गाण्यामुळे हा असा इतिहास माझ्या मनात कायमचा कोरला गेला आहे. लग्नाला यंदा ४५ वर्षे होतील. पण आजही जेव्हा केव्हा हे गाणे मी ऐकते तेव्हा नकळत डोळ्यांपुढे धुके दाटतेच.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाबासाहेब…शुभा गोखले. ☆ सुश्री मीनल केळकर

babasaheb purandare felicitation ceremony: बाबासाहेब पुरंदरेंचा उद्या नागरी सत्कार; निमंत्रितांच्या यादीत 'या' दिग्गजांचा समावेश - shiv shahir babasaheb purandare turns 100 ...

? बाबासाहेब बळवंत मोरेश्वर पुरंदरे ?

?  मनमंजुषेतून ?

☆ बाबासाहेब…शुभा गोखले. ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

पद्मविभूषण महाराष्टभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शतक-वर्षात पदार्पण करत आहेत याचा आनंद सोहळा मनात सुरु असतांनाच, त्यांच्या निधनाची दुःखद बातमी ऐकावी लागली, आणि त्यांच्याविषयीच्या आठवणी मनात दाटून आल्या. त्यातली ही एक अगदी पहिली आठवण —–

पुण्यात रहात असल्यामुळे त्यांना अनेक प्रसंगी पाहण्याचं भाग्य मला लाभलंय… मग ते ‘ जाणता राजा ‘’च्या प्रयोगादरम्यान असो,  नाहीतर टिळक स्मारकमधे राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार समारंभात असो.  पण एका छोट्या प्रसंगी त्यांची-माझी झालेली प्रत्यक्ष भेट मी कधीच विसरू शकत नाही ! 

साधारण ४०-४५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. पुण्यातल्या पेशवे-काळातल्या  विश्रामबागवाड्याला जुन्या वैभवाकडे परत नेण्याचा बाबासाहेबांनी विडा उचलला होता. त्याचाच भाग म्हणून असावा बहुधा, त्यांनी एक  प्रदर्शन तिथे आयोजित केलं होतं. प्रदर्शन दुसऱ्या दिवशीपासून सुरू होणार होतं, पण संध्याकाळचे ७ वाजून गेले असल्याने  दुसऱ्या दिवशीची तयारी म्हणून सगळ्या पाट्या, बॅनर वगैरे विश्रामबागवाड्याच्या तळमजल्यावर लागलेलेही  होते.  त्यावरची तारीख न पाहताच मी घाईघाईने वर पोहोचले (कारण प्रदर्शनाची वेळ ७.३०पर्यंत लिहिलेली होती)! 

आत गेले तर पांढरी दाढी असलेलं एक तेजस्वी व्यक्तिमत्व प्रदर्शनाच्या तयारीवर शेवटचा हात फिरवत होतं. बाकी कुणीच नव्हतं ! माझी चाहूल लागल्यावर त्यांनी वळून प्रेमाने विचारलं, “ अगं आजच आलीस का ? प्रदर्शन तर उद्यापासून आहे ! “

मी पण निर्भयपणे सांगितलं की, “ आता खाली पाटी दिसली म्हणून आले. आम्ही लांब रहातो. आणि आता  परत गावात येता येणार नाही पुढच्या दोन दिवसांत ! “

मग त्यांनी ‘ बरं ‘ म्हणून सगळ्या प्रदर्शनाचं दर्शन घडवत मला वाड्याच्या गतवैभवाची कथा सांगितली. 

अशी exclusive treatment मिळणारी मी किती भाग्यवान होते हे कळायचं ते वय नव्हतं ! प्रदर्शनाची सैर संपल्यावर, शेवटाकडे पोहोचल्यावर तिथली पाटी वाचून मी चक्क फ्रॉकच्या खिशातून आठ आणे काढून त्यांना देऊ केले ! त्यांना माझं काय करावं हेच कळेना ! “ अगं राहू देत “ ते म्हणाले.  तर माझा एकच धोशा…’ प्रदर्शन बघण्याचं मूल्य ५० पैसे आहे ना पण !’ शेवटी माझी समजूत काढत म्हणाले की,” ते मूल्य उद्यापासून प्रदर्शन सुरू झाल्यावरसाठी आहे ! “ —   मग त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून आशिर्वाद दिला की ‘ शाळेत  इतिहास छान शिक ! ‘

—-आता इतक्या वर्षांनंतर या सगळ्या संस्कारांचं महत्व पटतंय ! आपला बहुमोल वेळ एका शाळकरी मुलीसाठी इतक्या सहजपणे खर्च करायची त्यांची तयारी, आता मला माझ्या विद्यार्थ्यांंसाठी केव्हाही वेळ द्यायला नेहमीच प्रेरणादायी ठरते ! 

श्री. बाबासाहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!!

– शुभा गोखले

संग्राहक – सुश्री मीनल केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मोक्ष कशात आहे ? – मुकुंद पुराणिक ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार

सौ.अस्मिता इनामदार

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ मोक्ष कशात आहे ? – मुकुंद पुराणिक ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार☆

चुनीलालजींना चालतांना कष्ट पडतात, पण आठवड्यातून कमीतकमी ३ वेळा ५०० मीटर लांब असलेल्या शंकर मंदिरात ते नियमित जात असतात. भाविक प्रवृत्तीचे आहेत. भगवान शंकराचं मंदीर आमची इस्टेट आहे, असं म्हणत ते दर्शनाला जातात. चांगली गोष्ट आहे ! 

माणूस श्रद्धावानच असावा. दगडाच्या देवावर, देवस्वरूप माणसांवर, सत् अशा कार्यांवर माणसाची श्रद्धा असणं स्वाभाविक आहे. पशू नसल्याचं… आणि माणूस असल्याचं ते एक लक्षण आहे. 

पण देवळांतील देवावर श्रद्धा ठेवत असता, आपल्या क्षेत्रात काही अन्य सामाजिक व राष्ट्रीय उपक्रमांद्वारे, राष्ट्र चिंतन,राष्ट्र आराधन, राष्ट्र उपासना चालत असते, तिकडे चुनीलालजी ढुंकूनही वळत नाहीत. 

मोक्ष हा वैयक्तिक पुरुषार्थ आहे. देवळात जाण्याने मोक्ष मिळतो….आणि मातृभूमीच्या संवर्धनार्थ योजिलेल्या कार्यात,आयामात, प्रकल्पांत तो मिळत नाही,असं वाटणं कितपत योग्य आहे ? 

मला वाटतं, या क्षेत्रात मोक्ष तर मिळतोच… पण ‘धर्म-पुरुषार्थ’ ही घडतो. आपल्या वैयक्तिक सत्कर्मात व संस्थांच्या सेवा प्रकल्पात धर्म आहे, ऋणमोचन आहे, ऋण फेडल्याचं समाधान आहे… हे आम्ही लक्षात घ्यायला हवे की नको ?  

जय भोलेनाथ ! जय श्रीकृष्ण ! प्रभू श्री रामचंद्रकी जय ! याच सुरात व याच भाव-भक्तीने, तन्मयतेने “भारत माता की जय !” चा जयजयकार तितकाच मोक्षदायी नाही का ?

देवासमोरचं कीर्तनसुद्धा आता अध्यात्मिक कमी व राष्ट्रीय अंगाने जाणारे अधिक होते आहे…. तेव्हा मोक्ष संकल्पनेचे तात्पर्य-अर्थ  देव, देऊळ यातच सिमीत आहेत… असं मानणं उचित नाही.

श्रीसमर्थ रामदास स्वामींनी राष्ट्र कारण केलं… संत गाडगेबाबांनी स्वच्छकारण केलं… कुणी महापुरूषांनी दलित समाजोद्धाराचं कार्य केलं… राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने व स्वयंसेवकांनी सेवा कार्ये पार पाडली, पाडताहेत…. मातृभूमीच्या रक्षणार्थ सैनिकांनी बलिदान केले… आजही करताहेत… या सर्वांना  ‘धर्म व मोक्ष’  हे दोन पुरूषार्थ तर प्राप्त झालेच, शिवाय अधिक काही ! 

जीवनाचा परमार्थ उलगडण्याचे  जिथे प्रामाणिक प्रयत्न होतात, तिथेही धर्म व मोक्षाचं दान पडतं, हे समजून घ्यायला हवे. 

आपल्याला काय वाटतं ?

ले : मुकुंद पुराणिक

संग्रहिका – सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तुलसी विवाह ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? मनमंजुषेतून ?

☆ तुलसी विवाह ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

नुकतीच दिवाळी संपली आहे, पण तरी परवापासून सुरु झालेल्या तुळशीच्या लग्नामुळे अजूनही मस्त सणाचे  वातावरण आहे, नुसते आजूबाजूला नाही, तर फेसबुक वर पण..

आज असंच दिरांशी बोलता बोलता , तुळशीच्या लग्नाचा विषय  झाला … आम्ही सांगलीत असताना दिरांकडे धडाक्यात ते लग्न साजरे करायचो.. तेव्हा माझ्या मनात लहानपणापासून पाहिलेली तुळशीची लग्नं आठवायला लागली ! आणि वाटलं की खरंच आपण का करतो तुळशी चे लग्न ?,हे आताच्या पिढीला समजेल अशा पध्दतीने सांगायला पाहिजे ! म्हणून हा लेखनप्रपंच !

आम्हीही लहानपणापासून तुळशीचे लग्न पाहिलंय. पण आता मुलींना त्याची कारणमीमांसा पण लागते. त्यामुळे मी लगेच त्याबद्दलची माहिती शोधायला सुरुवात केली. 

यामागची पौराणिक कथा आहे ती अशी–जालंदर नावाचा असुर देवांना अजिंक्य झाला होता. त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता होती. विष्णूने जालंदरचे रूप घेऊन वृंदेचे सत्वहरण केले. 

तेव्हा जालंदराने तिला शाप देऊन दगड केले. तेव्हा ती सती वृंदावनात प्रकट झाली. हीच ती  ‘तुळस ‘— विष्णूने याचे प्रायश्चित्त म्हणून तिच्याशी विवाह केला. विष्णूच्या कृष्णावतारात हे लग्न झाले. त्यामुळे आपण विष्णू आणि कृष्णाला तुळस वहातो.

—– या सर्व पुराणकथा झाल्या !

पण आताही आपण तुलसी विवाह का करतो ? आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्ट निसर्गाशी निगडीत केलेली आहे. निसर्गातील प्राणी, पशू- पक्षी, वनस्पती, वृक्ष- वेली, हे आपले सगेसोयरे आहेत. 

त्यामुळे माणूस या सर्वांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उत्सव करतो. जसे वटपौर्णिमा, नागपंचमी, नारळी पौर्णिमा… पंचमहाभूतांचे त्या निमित्ताने स्मरण केले जाते. 

तुलसी विवाहाची प्रथा ही अशीच आली असावी. तुळस ह्या वनस्पतीचे शास्त्रीय महत्व आहे. तुळशीचे झाड हे चोवीस तास ऑक्सिजन देणारे आहे. तिच्या मंजि-यांपासून असंख्य रोपे तयार होतात. सर्वांना ऑक्सिजन मिळावा म्हणून पूर्वी घराभोवती तुळशीची झाडे वाढवली जात. तुळशीमुळे कीटक येत नाहीत, इतकंच काय डासही कमी होतात. तुळशीचा रस अंगाला लावला की डास चावत नाहीत. तुळशीची पाने औषधी आहेत. तुळशीच्या पानांचा रस खोकल्यासाठी उपयुक्त आहे. तसेच त्वचेच्या रोगांवरही तुळशीचा रस उपयोगी असतो. अशी ही बहुगुणी तुळस पूजेसाठी योग्य ठरली !

पूर्वी च्या काळी स्त्रियांचे घराबाहेर पडणे समाजात मान्य नव्हते. त्यामुळे त्यांना घराबाहेरची मोकळी हवा मिळत नसे. अशा विचाराने बहुतेक तुळशीला रोज स्त्रियांनी पाणी घालण्याची पध्दत  आली असावी. पूर्वी वाडा संस्कृती होती, तेव्हा वाड्यात शिरले की  मधोमध तुळशी वृंदावन असे. 

ती एक पवित्र जागा असे, जिथे संध्याकाळी घरातील स्त्रिया, मुले बाळे बसून शुभंकरोती, परवचा म्हणत असत. तुळशीसमोरच्या पणतीच्या शांत उजेडात मनही शांत होऊन जाई !

या दिवसात चिंचा,बोरे,आवळे यायला सुरुवात होते. ही फळे म्हणजे व्हिटॅमिन ‘सी’ चा साठाच जणू ! त्यामुळे तुळशी विवाहाच्यावेळी ही सर्व फळे पूजेसाठी असत.आपोआपच घरातील मुलांना ती  खायला मिळत. उसाची मोठी झाडे आणून ती तुळशीला मांडव म्हणून वापरली जात. दिवाळी  झाल्यानंतर मुलांसाठी तुळशीचे लग्न हा एक आनंददायी कार्यक्रम असे. दिवाळीत राहिलेले फटाके 

तुळशीच्या लग्नात उडवून संपवायचे. दिवाळी फराळ संपत आला असला तरी नवीन लाडू, करंजी लग्नासाठी बनवली जात असे. तुळशीचे लग्न झाले की विवाह- मुहूर्त सुरू होत असत. आणि वातावरण सणांकडून लग्न समारंभाकडे वळत असे.

तुळशीचे लग्न ही गोष्ट आता जरी कालबाह्य वाटत असली तरी तुळशीचे गुणधर्म काही नाहीसे होत नाहीत ! निसर्ग आणि ईश्वर  यांची सांगड आपल्या संस्कृतीत अशा पध्दतीने घातली गेली आहे. शिक्षणामुळे ज्ञान वाढले, सुबत्ता आली, पण अशांतता ही वाढली. एकत्र कुटुंब पद्धती कमी झाली. प्रत्येक कुटुंब म्हणजे एक बेट बनले आहे !  हे असे प्रसंग लोकांना जोडून ठेवायला मदत करतात. . हल्ली लोकांना एकटेपणा मुळे इतक्या मानसिक समस्याना तोंड द्यावे लागते.. नुसती  भौतिक प्रगतीच नाही तर मन:स्वास्थ्य  जपणे हे तितकेच महत्वाचे आहे . आपल्या संस्कृतीतून हे  आपसूकच घडून येत असे

— दुसऱ्याच दिवशी तुळशीचे लग्न करून मुलीने पण तुळशी लग्नाचे फोटो पाठवले. स्वत: छान साडी नेसलेला, नातीने परकर पोलके घातलेला, आणि नातवाने तुळशीसाठी अंतरपाट

धरलेला आणि हे सर्व कौतुकाने जावई बघत आहेत—असे फोटो मोबाइलवरून आले.आणि क्षणार्धात माझे मन विमानाच्या वेगाने दुबईला पोचले…तुलसी विवाह कसा साजरा झाला हे बघण्यासाठी !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बा.द.सातोस्कर….भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

??

☆ बा.द.सातोस्कर….भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पाहिलं-  त्यांनी जाई ही स्वतंत्र कादंबरी लिहिली. त्याचाच पुढचा भाग मेनका लिहिली. अनुपा, अभुक्ता, दिग्या शा अनेक कादंबर्‍या त्यांनी पुढे लिहून प्रकाशित केल्या.- आता इथून पुढे ) —-

बा. द. सातोस्कारांची  महत्वाची पुस्तके मात्र सागर साहित्यानी नाही,  शुभदा सारस्वत’चे प्रकाशक, गोगटे यांनी काढली आहेत. ही  पुस्तके केवळ लेखक सातोस्कर यांची नाहीत, तर लेखक आणि संशोधक सातोस्करांची आहेत. मराठी मासिकांचे पहिले शतक’  हे त्यांचे पुस्तक १९८६ साली प्रकाशित झाले. हे पुस्तक माहितीपूर्ण आहेच, पण संदर्भ साहित्य म्हणूनही उपयोगी आहे. गोमंतकीय मराठी साहित्याचे आधुनिक शिल्पकार हे पुस्तक ‘सागर साहित्या’ने ७५साली  काढले. अर्वाचीन गोव्याचा इतिहास त्यांनी ३ खंडात लिहिला आहे. त्यांचे सर्वात महत्वाचे संशोधनपर पुस्तक म्हणजे गोमंतक प्रकृती आणि संस्कृती – ३ खंड.   हे ग्रंथ  शुभदा सारस्वत’ ने प्रकाशित केले आहेत . यात गोव्याचा प्राचीन इतिहास आहे, गोव्याचे प्राकृतिक वर्णन आहे. समाजव्यवस्था, लोकांची संस्कृती, सण , उत्सव सगळे आहे. या ग्रंथाचा पहिला खंड १९७९ साली प्रकाशित झाला. याला ‘केसरी मराठा संस्थेचा तात्यासाहेब केळकर पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यानंतर प्रकाशित झाले, ते बादसायन’ हे त्यांचे आत्मचरित्र. हे आत्मचरित्र म्हणजे काही केवळ ‘बा.द. सातोस्कर’ यांचे स्वत:चे चरित्र नाही. त्याला गोव्याचे अस्तर आहे. गोमंतकीय समाज , तिथले लोकजीवन, तत्कालीन गोव्याचे वातावरण , गोव्याचा निसर्ग याला जोडून ते येते. ‘बादसायन’ प्रकाशित झाले १९९३ मधे . ‘शुभदा सारस्वत’ नेच  ते प्रकाशित केले. या दरम्यान त्यांनी रामायणाचा अभ्यास करून अभिराम’ ही कादंबरी लिहिली. यावेळी त्यांचे वय होते ८० .  त्याच अभ्यासातून पुढे रामायणकालीन जमाती व संस्कृती असे एक छोटेखानी पुस्तकही लिहून टाकले. 

    १९८५ च्या दरम्यान दादा आजारी पडले. प्रकाशनासाठी करावी लागणारी दगदग त्यांना सहन होईना. आई आधीच गेली होती. मग त्यांनी ‘सागर साहित्य प्रकाशन’ बंद केले. ते शेवटचे माझ्या घरी आले, तेव्हा विषादाने म्हणाले होते, “ गोव्यात गेलो, तेव्हा दोन गोष्टी डोळ्यापुढे होत्या. मराठी हीच गोव्याची भाषा आहे, हे सिद्ध करायचे. आणि भाषिक व सांस्कृतिक एकतेच्या आधारावर महाराष्ट्र आणि गोवा यांचे एकीकरण घडवून आणायचे.” पण त्यांना हे शक्य झालं नाही, आणि याची बोच त्यांनी कायमची आपल्या काळजात वागवली. 

  पुढे माझ्या बहिणीने- लताने गोव्यातलं आपलं बिर्‍हाड – बाजलं हलवून पुण्याला मांडलं. मग गोव्यात जाणं झालंच नाही. नंतर दादा अर्धांगाने आजारी असल्याचे कळले. आई आधीच गेली होती.  दादांना भेटून यावं, असं खूप मनात होतं. पण त्यांना भेटायला जाणं नाहीच जमलं. नंतर दादा गेल्याचीच बातमी पेपरमध्ये वाचली.  

  दादा म्हणजेप्रकाशक, लेखक, संपादक, संशोधक, गप्पिष्ट, माणसांचे लोभी, कृतिप्रवण अशा व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंनी झळझळणारे लोलकाचे लखलखते झुंबर. ते मालवलं आणि गोव्याचं माझं माहेरही सरलं —-

-समाप्त-

©️ श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हितगुज ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे

सौ.मंजुषा सुधीर आफळे

? मनमंजुषेतून ?

☆ हितगुज ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆ 

आज गौराईचे विसर्जन . प्रत्यक्ष जगत्जननी माहेरपणाला आली होती . तीन दिवस तटस्थ व्रतस्थपणे उभी होती . माझे घर न्याहाळत होती . नुसत्या कुंकवाचा तिलक  लावल्यामुळे किती तेजस्वी व प्रसन्न दिसत होती . घरभर फिरली . दृश्य अदृश्य गोष्टी पाहात होती . अगदी तिच्या स्वागतासाठीचा माझा आटापिटाही तिने पाहिला असेल . मी केलेल्या पाहुणचाराने ती खूश झाली असेल ना ! आज तिने निरोप घेतला .  तरीही तिच्या अस्तित्वाचा सुवास सुगंध घरभर दरवळत आहे . माझ्या मनातही तो रेंगाळून राहिला आहे . गौराईचा  निरोप घेताना डोळे भरून तर येतातच .  आरती मधील  शेवटच्या  कडव्यांचे उच्चारही कधी कधी नीट होत नाहीत . मन भरून येते .

चतुरानने कुत्सित कर्माच्या ओळी॥

लिहिल्या असतील माते माझे निज भाळी॥

पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी ॥

मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥

हे आई , माझ्या नशिबात सर्वच कुशल मंगल असणार नाही हे मी जाणते . पण तू माझ्याजवळ असलीस तर सर्व अमंगल आपोआप पुसून जाईल . प्रथम आम्हाला स्वतःमधील वाईट गुणांचे , वाईट सवयींचे विसर्जन केले पाहिजे . चराचरातील प्रत्येकाकडे सहृदयतेने पाहिले पाहिजे . तूच दिलेल्या दिव्य शक्तीची आम्हाला जाणीव झाली पाहिजे .

‘ थोडी श्रद्धा व विश्वास माझे ठायीं ठेवा म्हणजे या संसाररूपी खेळात तुम्हाला आनंद मिळेल,’ असेच काही तू सांगत होतीस ना !

खरेच आई आज थोडे थोडे कळते आहे . जीवनातील हा संसाररूपी खेळ म्हणजे एक श्रेष्ठ शाश्वत सत्य आहे . या सृष्टीत माणसाने सुखाने जगावे म्हणून तू किती भरभरून दिले आहेस . तुझी प्रत्येक  निर्मिती रसपूर्ण , सौंदर्य युक्त आणि परिपूर्ण आहे . पण आम्हाला हे समजून घेण्याला किती काळ जाईल कोणास ठाऊक ? चराचरात तुझ्यामुळे व्यापून असलेला आनंद आम्हाला कधी ओळखता येणार ? भरभरून देण्यामधले समाधान आम्हाला कधी कळणार ? केवळ ममतेने जग जिंकता येते हे कधी अनुभवता येणार ? प्रत्यक्षात पृथ्वीतलावर स्वर्ग लोकाची अनुभूती येईल असा सुदिन लवकर येवो, म्हणजे तुझ्या आरतीचा अर्थ खऱ्या अर्थाने आम्हाला कळेल .

जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी॥

वससी व्यापक रूपे तू स्थूलसूक्ष्मी॥

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

विश्रामबाग, सांगली.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares