मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नातं ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ मनमंजुषेतून ☆ नातं ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

नातं कस असावं, तर एखादा गोफ सुरेख विणलेला असतो तस असावं. एकमेकांची मने घट्ट सुबक विणलेली असावीत.

एकाच्या दुःखाने नकळत दुसर्‍याच्या पापण्या ओल्या व्हाव्यात, तर एकाचे सुख दुसर्‍याच्या चेहर्‍यावर ओसंडून वहावे.

नात्याला कोणते लेबल असलेच पाहिजे असे नाही,पण असलाच तर खरेपणा असावा, प्रेम, जिव्हाळा असावा, विश्वास असावा आणि महत्त्वाचे म्हणजे नात्यात पारदर्शकता असावी. जे असेल ते उघड आत बाहेर काही नाही, लख्ख प्रकाशा सारखे.

नातं माऊ गोधडी सारख असावं, मायेच्या उबेन भरलेल हव. हव हव असवाटणार खरखरीत रगा सारख नसावं, जे हव तर असत पण नाईलाज म्हणून.

मला खरच मनापासून वाटते की एखाद तरी नातं अस नक्की असावं, जिथे हक्काची एक हाक असावी, मायेची एक थाप असावी आणि न मारलेली हाक सुद्धा त्या व्यक्तिला ऐकु जावी.

खूप कमी जणांच्या नशिबात अशी नाती असतात आणि ज्याला ती मिळतात तो खरा भाग्यवान नाही का? असे मला तरी वाटते. तुम्हाला काय वाटते??

सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शहाणपणाची उघडा कवाडे ☆ श्री सतीश स. कुलकर्णी

श्री सतीश स.कुलकर्णी 

☆ मनमंजुषेतून ☆ शहाणपणाची उघडा कवाडे ☆ श्री सतीश स. कुलकर्णी ☆ 

‘The only thing you absolutely have to know is the location of the library.’

अल्बर्ट आईनस्टाईन ह्यांचं हे प्रसिद्ध वाक्य आहे. आमच्या वाचनालयाचं स्थळ माझ्यासह सगळ्याच सभासदांना अगदी चांगलं माहीत आहे. पण आमच्यासारख्या सामान्यांच्या जगण्यात त्याचं नेमकं ‘स्थान’ काय आहे (किंवा काय असावं!), हे प्रशासनाला किंवा राज्यकर्त्यांना उमगलेलं नाही. त्यामुळंच सार्वजनिक वाचनालयांची दारं अजून बंदच आहे. ती कधी उघडणार, ह्याची काहीच कल्पना नाही.

राज्य सरकारनं ५ ऑक्टोबरपासून बार, रेस्टॉरंट उघडायला परवानगी दिली. आणखी काही गोष्टी केल्या आणि काही जुने निर्बंध चालूच ठेवले. ह्यात कुठेच ग्रंथालयांचा-वाचनालयांचा उल्लेख नाही, हे विशेष. असा अनुल्लेख म्हणजे उपेक्षाच!

साक्षरतेचे प्रमाण ८० टक्क्यांच्या घरात गेलेल्या आपल्या देशातील बहुसंख्यांना वाचनालये उघडावीत, त्यासाठी काही मागणी करावी, असं वाटल्याचं दिसलं नाही. (काही तुरळक अपवाद असतील.) वृत्तपत्रांद्वारे कोरोनाचा फैलाव होतो, अशा ‘व्हॉट्सॲप विद्यापीठीय’ बातम्यांचा पूर आल्यानंतर तसा तो होत नाही, हे सांगण्यासाठी वृत्तपत्रांची एकच घाई उडाली. त्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी ह्यांना बोलते करून त्या बातम्या पहिल्या पानावर ठळकपणे छापण्यात आल्या. वृत्तपत्रांच्या माध्यमातून विषाणू पसरत नसेल, तर तो पुस्तकांच्या पानांमधून कसा पसरेल, असा प्रश्न वाचनालयांच्या बाबतीत विचारायचं मात्र विसरूनच गेलं.

‘अनलॉक : ५’च्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेला मात्र जाग आली. ‘ग्रंथालये बंद असणं, ही बाब एकूण साहित्य व्यवहाराच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे ती उघडण्यास परवानगी द्यावी,’ अशी मागणी साहित्य परिषदेनं केल्याची बातमी शुक्रवारच्या दैनिकांमध्ये आहे. पण एकूणच साहित्य व्यवहार पाहणाऱ्यांना काय किंमत द्यायची किंवा त्यांच्याशी कसा व्यवहार करायचा, हे प्रशासन हाकणाऱ्यांना किंवा राज्यकर्त्यांना माहीत आहे. त्यामुळे ‘मागणी केली, बातमी आली’ एवढ्यावरच समाधान मानण्याची वेळ.

अधिकृत परवानगी मिळाल्याच्या किती तरी दिवस आधीपासून रेस्टॉरंट आणि बारमध्ये सहजपणे ‘बसता’ येते, अशी चर्चा कर्णोपकर्णी असते. तिथे ग्रंथालयावरचे निर्बंध मात्र कडकपणे चालू असतात. त्यावाचून कुणाचे काही अडत नाही, ही तर भावना त्यामागे नसावी ना?

ह्या कसोटीच्या काळात वाचन-संस्कृतीच्या कसोटीला आपण उतरावं, ह्या भावनेनं वाचनालयाकडून काही झाल्याचं दिसलं नाही, ह्याचं वाईट वाटतं. वाचनालय सुरू व्हावं ह्यासाठी आम्ही सभासदांनीही रेटा लावला नाही. (हा लेख khidaki.blogspot.com इथे प्रसिद्ध झाल्यानंतर दोन दिवसांपासून काही वाहिन्या व वृत्तपत्रे ह्यांनी ही मागणी लावून धरली.)

इंटरनेटवर भटकताना कॅनडाच्या ओंटारिओ परगण्यातील ‘किचनेर पब्लिक लायब्ररी’ चं संकेतस्थळ दिसलं. काही शाखा असलेलं हे वाचनालय १० ऑगस्टपासून पुन्हा चालू झालं. त्याचा आनंद संकेतस्थळावर व्यक्त झालेला दिसतो. सभासदांना उद्देशून तिथं लिहिलं आहे – ‘आमच्या ह्या जागेत तुमचं पुन्हा स्वागत करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे! खूप दिवसांपासून आम्हाला तुमची आठवण येत होती…’ सरकारच्या अनुदानावर (म्हणजे जनतेच्या पैशातून) चालणाऱ्या इथल्या सार्वजनिक वाचनालयांना आपल्या वाचकांची अशी मनापासून आठवण झाली का?

समर्थ रामदास स्वामींनी ‘प्रसंगी अखंडित वाचीत जावे’ असं लिहून ठेवलं. त्यातलं अखंडित महत्त्वाचं आहे. सफ़दर हाशमी ‘किताबें’ कवितेत लिहितात –

किताबें करती है बातें

बीते जमानों की

दुनिया की, इंसानों की

आज की कल की

एक-एक पल की।

खुशियों की, ग़मों की

फूलों की, बमों की

जीत की, हार की

प्यार की, मार की।

सुनोगे नहीं क्या

किताबों की बातें?

आपण सगळ्याच पातळ्यांवर कान बंद करून घेतल्यानंतर पुस्तकांचे हे अस्फुट उद्गार त्या पानांतून कसे ऐकू येतील!

वाचल्यानं माहिती मिळते, ज्ञान वाढतं. माणूस शहाणा होतो म्हणतात.

आपली प्रजा शहाणीसुरती असावी, असं कोणत्या जमान्यातील राज्यकर्त्यांना वाटत असतं हो!

हा सविस्तर लेख व असे अन्य लेख वाचण्यासाठी भेट द्या – khidaki.blogspot.com

 

©  श्री सतीश स.कुलकर्णी 

संपर्क – [email protected],  [email protected]

(चित्र साभार श्री सतीश स. कुलकर्णी )

 

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विलक्षण योगायोग ☆ श्रीमती सुधा भोगले

☆ मनमंजुषेतून ☆ विलक्षण योगायोग ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

माझ्या मैत्रिणीला तिच्या वैभवसंपन्न,विद्याविभूषित,अशा माहेरच्या आठवणींचे पुस्तक करायचे होते त्याचे पुनर्लेखन करताना, त्यात १९६२ च्या चीन युद्धात वीरगती मिळालेल्या तिच्या भावाची हकीकत आहे.

पुण्याला लष्कर भागात, दक्षिण कमांडच्या वीरगती प्राप्त झालेल्या जवानांचा स्मृतीस्तंभ उभारला आहे. एका संध्याकाळी मी व माझी मुलगी हा स्तंभ बघायला गेलो. थोडासा अंधारच झाला होता, परावर्तीत प्रकाश दिवे तो परिसर उजळून टाकत होते. विस्तीर्ण आवारचे सुशोभित फाटक बंद होते. बाहेर सुगंधित बुचाच्या फुलांचा सडा पडलेला होता तेवढ्यात एका लष्करी जवानाने फाटक उघडले. आम्ही स्तंभाच्या दिशेने मार्गक्रमित झालो तेथील शांततेमुळे वातावरण उगाचच गंभीर वाटत होते. स्तम्भाशी जाऊन आम्ही मनोमन नमस्कार केला. स्तंभाच्या मागील बाजूस संगमरवरी फरश्यांवर धारातीर्थी पडलेल्या जवानांची नावे दिमाखाने झळकत होती. आम्ही डाव्या बाजुने उतरलो व नावे वाचण्यास सुरुवात केली. मनात विलक्षण भावना गोळा झाल्या होत्या. एवढ्या नावात अपेक्षित नाव कस मिळणार ? भ्रमणध्वनीचा प्रकाश बघता बघता एका नावावर स्थिरावला, ‘व्ही. एन. आठल्ये’. दूरभाष संचावर टंकलिखित केले, “IC  12635 21 LtAthaley VN.” !

विष्णू भावाच्या नावामागील क्रमांक लष्कराच्या रेकॉर्ड मधील होता. स्तंभाला प्रदक्षिणा घालून शेजारच्या पांढऱ्या शुभ्र फ्लोरीबंडा जातीच्या गुलाबपुष्पातील एक सुंदर पुष्प तोडून घेतले सद्गदित अंत:करणाने ती पुष्पमय श्रद्धांजली आपल्या विष्णूभाऊबरोबर इतर वीरजवानांना अर्पण केली. नकळत डोळ्यात अश्रू आले.

इतक्या फरश्यावर असलेल्या अनेक नावात नकळत अपेक्षित नावाच्या फरशीसमोर पोहोचले हा एक ‘विलक्षण योगायोगच नव्हे का’ !

त्या घरातील व्यक्तींशी नकळत माझा पूर्वीचा ‘ऋणानुबंध’ असावा असं मला जाणवलं.

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पंडित संजीव अभ्यंकर ☆ श्री प्रसाद जोग

☆ मनमंजुषेतून ☆ पंडित संजीव अभ्यंकर ☆ श्री प्रसाद जोग ☆

पंडित संजीव अभ्यंकर

वाढदिवस / जन्म : ५ ऑक्टोबर १९६९

त्यांना घरातच गुरु हजर होता. त्यांची आई शोभा अभ्यंकर यांनी त्यांना प्राथमिक  सांगीतिक  धडे दिले. पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांनी  संजीव अभ्यंकर याना  मार्गदर्शन केले. हिराबाई बडोदेकर आणि वसंतराव देशपांडे यांनी त्यांना जसराजांकडे शिकायला पाठविण्याची शिफारस केली. जसराजांचे शिष्यत्व स्वीकारल्यानंतर त्यांची दिनचर्या पूर्णत: बदलली.

गुरु शिष्य परंपरेप्रमाणे शिक्षण घेण्यासाठी गुरूच्या घरातील वेगळा दिनक्रम सुरु झाला. आपले आपण उठून शिष्यांनी रियाजाच्या खोलीत रियाज सुरू करावा, अशी गुरुजींची   शिकवण होती. त्यांच्या घराच्या गच्चीत रियाजाची छोटी खोली होती. तिथे जाऊन गायला बसायचे, त्यांना मनात येईल तेव्हा जसराज यायचे आणि शिकवायचे. त्यांनी शिकवलेले सकाळ, दुपार, संध्याकाळ असे तीन वेळा गायचे असा नियम होता. त्या त्या वेळचे राग म्हणायचे. रोज तेव्हा चार ते साडेचार तास गायन व्हायचे. त्यावेळी गळा तयार करायचा होता त्यामुळे सगळे राग गळ्यावर चढवायचा रियाज असायचा.

गुरु-शिष्य परंपरेनुसार त्यांचे शिक्षण चालू असताना,पं. जसराजांच्याबरोबर भारतभर दौरे, संगीत मैफिलींमध्ये त्यांना साथ-संगत आणि त्याचवेळी हिंदुस्तानी संगीतातील अभिजात स्वरांचे धडे, अशा नानाविध मार्गांनी त्यांची सांगीतिक प्रगती झाली . अकराव्या वर्षी संगीताची पहिली मैफल गाजविणार्‍या संजीव अभ्यंकरांनी त्यानंतर देशभरातील विविध महोत्सवांमध्ये आपल्या गायकीची छाप पाडली.

देशभरातील प्रख्यात संगीत महोत्सव आणि परदेशातील अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका या भागांतही  पं.संजीव अभ्यंकरांची गायकी  पोचली आहे. अभिजात शास्त्रीय संगीताबरोबर पार्श्वगायन, भावसंगीत आणि भक्तिसंगीताच्या प्रांतांतही त्यांनी स्वतःची छाप  उमटवली. हिंदी-मराठी भजने आणि बंदिशींच्या माध्यमातून  देशभरातील संगीतरसिकांच्या घरांत त्यांचे नाव पोचले आहे. स्वतःच्या काही बंदिशी रचून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

महाराष्ट्र शासनाने समर्थ रामदास स्वामी लिखित “दासबोध “पं.संजीव अभ्यंकरांच्या कडून गाऊन घेतला आहे व तो शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे व तो विनाशुल्क डाउन लोड करता येतो.

‘माचिस’, ‘निदान’, ‘दिल पे मत ले यार’ अशा चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. ‘गॉडमदर’ चित्रपटातील गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पं. जसराज जीवनगौरव पुरस्कार, सूररत्‍न यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मध्य प्रदेश शासनाने ‘कुमार गंधर्व पुरस्कार’ देऊन त्यांना गौरवले आहे.ऑल इंडिया रेडिओ ने १९९० साली त्यांना उत्कृष्ठ पार्श्वगायकाचा पुरस्कार दिला होता.

थोड्या  दिवसांपूर्वी आयॊध्येला राममंदिराच्या उभारणीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला आणि जगभरातली सर्वाना ध्यान लागलें रामाचें त्या प्रित्यर्थ पंडित संजीवजीं नी गायलेला अभंग

ध्यान लागलें रामाचें । दुःख हरलें जन्माचें

राम पदांबुजावरी । वृत्ति गुंतली मधुकरी

रामवदनमयंकीं । चक्षुचकोर जाले सुखी

तनुमेघश्याम मेळे । चित्तचातक निवाले

कीर्तिसुगंधतरुवरी । कुजे कोकिळा वैखरी

रामीरामदासस्वामी । प्रगटले अंतर्यामीं

यूट्यूब लिंक >>>  ध्यान लागलें रामाचें

पंडित संजीव अभ्यंकरांना  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .

 

© श्री प्रसाद जोग

सांगली.

९४२२०४११५०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रसन्नतेची प्रचिती ☆ श्रीशैल चौगुले

☆ मनमंजुषेतून ?प्रसन्नतेची प्रचिती? श्रीशैल चौगुले☆

आपण जीवन जगत असताना आपल्या देहाशी निगडीत आप तेज, वायू, पृथ्वी, आकाश या पंचतत्वाचा आत्मप्राणाशी सबंध येत असतो हे आपणा सर्वांना माहित आहे.

पण मन म्हणून जी एक आंतरीक भावनेशी क्रीयाशील अदृश्य ज्ञानस्पर्शाची शक्ती असते. हे मन चैतन्य प्रवृत्ती व विवेकजागृतीस चालना देत असते. म्हणून अध्यात्म गीताग्रंथातही भगवंताने मनाचे सामर्थ्य आपला शिष्य अर्जुनास सुंदर पध्दतीने वर्णन करुन सांगितले आहे.

‘मन करा रे प्रसन्न!’ अशा ओळी जेंव्हा मनालाच भावतात तेंव्हा सत्यप्रचिती येत असते. त्यास प्रसन्न अशी व्याख्या देता येईल.

एखाद्या सजीव-निर्जीव वस्तुवरील भावरुपी श्रध्दा-निष्ठा असलेस ती प्रत्यक्ष अपेक्षापूर्तीत ऊतरते तेंव्हा मनास आत्मप्रचिती भावते.

जसे संतांना पांडुरंग प्रसन्न, मिरेस श्रीकृष्ण, तुलसीदास, नरहरीस भगवान प्रसन्न तसे.

पण विस्मयचकीत होणेचे नाही. कारण इथे अनुभव माझ्या सामान्य निष्ठेचा एका महान व्यक्ती प्रसन्न होणेसी आहे.  ना मी पामर, ना ते भगवंत.

तसा माझा बाहेरचा प्रवास अत्यंत कमी. त्यात मला अधिक समरसतेची ऊत्सुकताही नसते. पण ज्या त्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील वातावारणाशी जुळवून घेणेची निश्चीतच प्रवृत्ती स्वभाव माझेजवळ आहे.

सासरेंनी मुंबईप्रयाणाची एका शब्दाने विचारणा करावी.आणि एका आपल्या घरच्या व्यक्तीसमवेतची ही संधी यावी याव्यतीरिक्त दुसरे भाग्य कोणते नसावे.झाले,सर्व माझ्या तयारीने सासरेसमवेत रात्री८-००च्या रेल्वेने मुंबई प्रवासास रवाना झालो.रात्रभर आमचे समोरच्या बैठकीवर असलेले दोन वकीलमित्रांशी वैचारीक गप्पा मारणेत कशी पहाट झाली हे कळले नाही.मात्र वाद-विवादात नक्कीच मला शिकायला काही मिळाले. ते ही नवोदीत प्रँक्टीस वकील मुंबई हाय कोर्टात निघालेले बहाद्दर आणि मला विचारवादाशी छेडछाड करणेची खोड सवय अर्थातच काही नव्याने ज्ञान प्राप्त करणेचा हेतू.

असो.अगदी साडे-पाचचे सुमारास व्हि. टी. स ऊतरुन साखर संघाचे निवास स्थानी स्नान वगैरे आटोपते झालो.सासरेंचै सर्व राजकीय नेत्याशी जवळीक असले तरी. मा. कै. विलासराव देशमुखजी त्यांचे खास मित्र व तेच संघाचे अध्यक्ष होते. त्यांच्या फोनमुळे पंधरा मिनीटे प्रतिक्क्षेत गेलेनंतर मुख्य मुंबईत म्हणजे मुंबई पोलीस मुख्यालय,नरिमन पॉंईंट, मरीन लाईन्स, तिथूनच दिसणारे, हॉटेल अँम्बँसिडर, समुद्राच्या बीचवरील मलबार हिल  सारे पाहून बरोबर सकाळी साडे नऊचे सुमारास चहा घेणेकरीता स्टेटस् हॉटेलवर चहा नाष्टा सेंटरवर पोहोचते झालो. हॉटेल दहा चे सुमारास चालू झाले. तोपर्यंत मी वृत्तपत्राची पाने चाळीत तेथील वृक्षविसावा पार्यावर बैठक मारुन थांबलो. तोपर्यंत सासरे,मेहुणेसोबत नाष्टा सेवन करीतच चाळत असलेले वृत्तपत्राचे शेवटचे पानांवरील क्रीकेटचे विशेष वृत्त पहात पहात महान खेळाडू सचिन तेंडूलकर यांचे दहा हजार पूर्ण झालेचे विक्रमी वृत्त वाचत राहिलो. ईतक्यात सासरेंनी ‘आणखी हवे का?’अशी विचारणा करता  वर मान करुन पाहिलो तर समोर हॉटेलमधे स्पोर्ट किटमधे दोघे चौघे नास्टा करीत होते. त्यांना मी कुठेतरी पाहिल्यासारखे वारंवार जाणवत राहिले. पण मनाने नेमकेपणा साधला नाही. सासरे-मेहुणे यांचेकडे काही मतीची गती थांबवणेचे शास्त्र असो वा नजरबंदीसारखे गारुड माकडनिती त्या क्षणी माझी वेळ दुर्भाग्यातच होती हे नक्की.कारण समोर चक्क तेंडूलकर, झहिर, कांबळी….असे मातब्बर कि जेआपल्याष देशाचे नाव ऊंचावण्याचे महान सत्कार्य आपल्या खेळकौशल्याने धन्य करतात.आणि मी मात्र वेड्यासारखा त्यांचेच वृत्तसमाचार पुढच्या ओळी वाचत रहातो.समोरुन लहान मुले छोट्या बँटवरती त्यांची सही आठवाण म्हणून घेत आहेत. मेहुणेही मला ‘तुम्ही सही घेणार का ? ‘ म्हणून विचारतात. पण मला पंढरीत जाऊन संतांसोबत पांडुरंग समोर प्रसन्न होऊनही न कळावा’ तसे हे जीवनातले दुर्भाग्य.

पुन्हा तेच तेंडूलकरच्या विक्रमी खेळाचे वृत्त पुढे वाचत रहातो वृत्तही संपते, नाष्टा संपवून बाहेर येतो. तिथून समुद्राकिनाराही जवळ असावा. हे सर्व खेळाडूही चक्क माझ्या काही अंतरावर डोळ्यासमोर टू-व्हिलरवरती बसतात. व मी माझे सासरे-मेहुणेसमवेत फोर्ट, गेटवे ऑफ़ इंडिया, लोखंडवाला, झवेरी बझारच्या प्रवासासाठी निघून जातो.

आता यामधे मीशकाही मुंबईशी परिचीत नसलेचा दोष वा वानखेड स्टेडियम तिथून जवळ असलेने ते खेळाडू सरावानंतर नियमीत या हॉटेलमधे नाष्टा करुन जात असलेचा माहितीचा अभाव.

पण काहीही म्हणा,या प्रंसंगात आत्मप्रचिती प्रसन्नतेची कृपा असलेली जाणीव आहे. जी अदृश्य स्वरुपात कृपाशील असावी. देशासाठी त्या-त्या सत्शीला सद्भावनेने देशभक्ती सेवा  देणारेही परमरुप म्हणजे देवच. कारण त्यांचे कार्याशी भक्ती-निष्ठा हे भाव आपणास भक्त बनवून जातात. समोर श्रीदत्त ऊभे आणि मी मंदिरात त्याचे ध्यानात दंग,अशी स्थिती निर्माण झाली.

वरील प्रसंगाचा ‘मन करा रे प्रसन्न //सर्व सिध्दीचे कारण//’

याचा प्रत्यक्ष साक्षात्कार.कृष्ण लिलेसारखा लिलया फसवा.

ज्या खेळाडूचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला चेंडू फलंदाजीच्या ऊत्सुकतेत समालोचन ऐकणेसाठी आतुर होऊन आकाशवाणीवर कर्ण एकरुप होतात व जागतीक दर्जाचा महान फिरकी गोलांदाजावर षटकार ठोकून लिलया आपल्या भारतदेशाचे फलंदाजीचे नेतृत्व सिध्द करताना आनंदाने त्या महान खेळाडूचे कौतुक करित रहातो .ते महान दैवत समोर प्रसन्न असूनही मी त्याच दुर्भाग्य क्षणात मनातून सलत रहातो.

हा प्रसन्नतेचा साक्षात्कार प्रत्येकाच्या जीवनात येत रहातो. फक्त सत्य स्विकारुन मन त्याच ध्यासात असावे लागते.सतत पाठांतर केलेला प्रश्नच परिक्षेत पडावा व नेमके त्याचवेळी ऊत्तरच आठवू नये अशी स्थिती या माझीया मनाची.

मा,खा.सचिन तेंडूलकर व त्यांचे सहाकारी खेळाडूंच्या या प्रसन्न दर्शनापुढे अस्वस्थपणे मन नतही होते.

(मुंबई प्रवासः २००४ प्रत्यक्ष अनुभवातून.)

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ओझं… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ मनमंजुषेतून ☆ ओझं… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

मावळतीच्या उतारावरून परत निघालेला निस्तेज सूर्य रोजच दिसतो खरा. पण आज मात्र त्याला पाहून आपसूकच जाणवलं की, आपलीही गाडी आता उताराच्या दिशेने जायला लागली आहे. गाडीतल ओझं फारच वाढल्याचं आताशा  वाटायला लागलंच होतं; आणि उताराला लागण्याआधी ते हलकं करायला हवंच होतं. मग हिम्मत करून आयुष्याचं जडशीळ गाठोड एक दिवस उघडायला घेतलं. त्याला घातलेल्या गाठींमधली पहिली गाठ लवकर सुटली. हेही माझे, तेही माझे करताकरता किती काय काय साठवून ठेवले होते मीच…. आता या अडगळीची विल्हेवाट लावून टाकायचीच अशा निश्चयाने कामाला लागले. कारण अजून थोडी तरी शक्ती बाकी होती. तीही संपल्यावर, हे प्रचंड ओझं सोबत घेऊनच पुन्हा पुढच्या गाडीत बसावं लागणार याची खात्री होती. पहिली गाठ सोडताच दिसल्या, मीच साठवलेल्या असंख्य वस्तू…… काही गरज म्हणून, काही आवडल्या म्हणून, आणि त्याहीपेक्षा जास्त वस्तू, केवळ हिच्याकडे- तिच्याकडे आहेत, मग माझ्याकडे हव्यातच, या हव्यासापोटी घेतलेल्या ….. पण या वस्तू “दानधर्म” म्हणत वाटून टाकणं फारसं अवघड गेलं नाही. दरवेळी मनावर मोठा दगड ठेवून ते काम त्यामानाने सहज उरकलं.

दुसरी गाठ मात्र जास्तच घट्ट होती. ती सोडवण्यात खूप वेळ गेला. आणि मग तो पसारा कसा आवरायचा कळेचना. त्यात होत्या….. नात्या-गोत्यांमुळे, ओळखी-पाळखींमुळे, कळत-नकळतजमा झालेल्या असंख्य आठवणी… काही जागरूकपणे आवर्जून जपलेल्या, आणि बऱ्याचश्या नकळतच साठत गेलेल्या. तो गुंता सोडवतांना हळूहळू लक्षात आलं की, हा पसारा आवरण्यात वेळ घालवण्याची गरज नाही.  उतारावरून जातांना औपचारिक आठवणी आपोआपच घसरून पडतील. आणि आवर्जून जपलेल्या आठवणी.. सोबत नेण्यासाठीच तर वर्षानुवर्षे जपल्यात. मग ती गाठ हलकेच पुन्हा मारून टाकली.

शेवटची गाठ सोडवताना मात्र दम संपायला लागला. खूप प्रयत्नांती थोडे सैल झालेले काही पदर ओढून पाहताक्षणी प्रचंड दचकले. जणू गारुड्याची पोतडीच होती ती. नको नको त्या मिजासींचे खवले मिरवणारे अहंकाराचे पुष्ट साप, द्वेष-असूया-मत्सर अशा जालीम विषांचे डंख मारायला टपलेले विंचू, मोह-मायेचे गोंडस पण फसवे रूप घेऊन वश करणाऱ्या कितीतरी बाहुल्या, ऐहिक सुखाच्या राशींवर बसून अकारण फुत्कारणारे मदमत्त नाग, आणि लहानशा सुखासाठी सुद्धा सतत वखवखलेल्या इंगळ्या………

बाप रे….. हे इतकं सगळं माझ्याकडे कधी, कसं आणि का साठवलं गेलं होतं ते मलाही कळलंच नव्हतं. पण हे ओझं इथेच उतरवून टाकलं नाही तर जिथे जायचंय ते ठिकाण नक्कीच गाठता येणार नाही, याची मात्र आता उशिराने का होईना, खात्री पटली होती. हा पसारा आवरणे खूपच कठीण आणि वेळखाऊ असणार हे मनापासून उमगल आणि मग चंगच बांधला. सुरुवातीला अशक्य वाटून धीर खचायला लागला होता खरा. पण याच पोतडीत अगदी तळाला जाऊन दडलेली दिव्य अस्त्रे नजरेस पडली……. सतप्रवृत्ती, सारासार विवेक आणि आजपर्यंत कधीच न जाणवलेला स्वतःतला ईश्वरी अंश… अशी कित्तीतरी अनमोल अस्त्रे बाहेर काढून लखलखीत केली आणि त्या इतर घातक गोष्टींना वारंवार चांगलंच झोडपून नेस्तनाबूत करणे सुरू केले. हळूहळू पण निश्चितपणे तो पसारा बराचसा आवरला गेला. यात अतिशय वेळ गेला, अंगातलं त्राणच गेलं हे खरं. पण मन मात्र खूप प्रसन्न झालं. आता गाडीत बसतांना ओझं वाटण्यासारखं काहीच बरोबर असणार नव्हतं. असणार होत्या ठेवणीतल्या प्रसन्न आठवणी, आणि भक्तिभावाची कोरांटीची फुलं ….हो. कोरांटीच. कारण आयुष्य सरत आलं तरी, येतांना आणलेले भक्तीच्या मोगरीचे इवलेसे रोप नीट रुजले आहे का ते पहायचं, त्याला खतपाणी घालायच, हे विसरतांना कारणांची कमी भासलीच नव्हती कधी. आणि आवराआवर करतांना शेवटी, एका कोपऱ्यात तग धरून राहिलेली ही कोरांटी दिसली…. त्या मोगऱ्याच्या जागी. पण तिची फुलेही पांढरीशुभ्र होती, त्यामुळे मन जरा शांतावले.  आणि ज्याच्याकडे जायचं होतं त्याला भेट काय द्यायची हा संभ्रम तर नव्हताच …. मी स्वतःच तर होते ती भेटवस्तू…………..

आता गाडी कधीही आली तरी मी तयार आहे ………..

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आगळं वेगळं सुख ☆ सौ. सुनिता अनंत गाडगीळ

 ☆ मनमंजुषेतून ☆ आगळं वेगळं सुख ☆ सौ. सुनिता अनंत गाडगीळ ☆ 

आम्ही दोघेच शिळोप्याच्या गप्पा करत बसलो होतो. सोसाट्याचा वारा सुटला आणि त्यापाठोपाठ पाऊस कोसळला. इतका की आम्हाला एकमेकांचे आवाज ऐकू येईनात. मग आम्ही दोघेच आमच्या नव्या नवलाईच्या दिवसांच्या आठवणी मनातल्या मनात आळवत शांत बसून राहिलो.

तीस वर्षांपूर्वी नवीन लग्न झालं. आम्ही आनंदात चिंब भिजत होतो आणि गळणाऱ्या घरात राहत होतो. कौलारू घर गळतीन भरून जायचं .   ठेवायची पातेली आणि थांबला पाऊस की त्यातलं मळकट पाणी द्यायचं  ओतून. ओली जमीन कोरडी करायची आणि पुन्हा परस्परांच्या प्रेमात चिंब व्हायचं असे ते छान दिवस होते.

दोघांनी मिळून घराच स्वप्न पाहिलं खूप मेहनत घेतली. तेव्हापासूनआमचा आयुष्य घाईगडबडीत झालं. उठा, आवरा, पळा, कामावरून या, झोपा ,आवरा, लवकर पळा असं चुकीचं पण आवश्यक. कारण भविष्यात सुख मिळायला हवं. भविष्याबाबत ची अनिश्चितता आयुष्याच्या नाण्याची दुसरी बाजू असते. अशीच स्वस्त पणाने मी आताही घरात बसले होते. शिळोप्याच्या गप्पात कुठेच अनिश्‍चितता डोकावत नव्हती.  गप्पा सरणाऱ्या नव्हत्याच….. पावसाने थांबलेल्या होत्या. अचानक छतावरून एक पावसाचा  थेंब माझ्या डोक्यात पडला. भांबावून जात मी वरती पाहिले. ज्या घराला तीस वर्षे पुरी झाली होती. त्या वास्तुने आलेला पुराचा तडाखा सोसला होता.  आमच्या घराने गतवर्षी इतक्या पावसाने सुद्धा कुठे गळती झाली नव्हती म्हणून आम्ही दोघेही खूप आनंदात होतो.

मी छताकडे पाहिले .एका कोपऱ्यातून टप टप टप संततधार सुरू झाली होती. ती पाहताना माझे डोळे मिटले. जणू बाहेरचा पाऊस  या डोळ्यात आला होता. आमच्या नव्या संसाराच्या नवलाईच्या दिवसाच्या आठवणी जाग्या करत होता. पंखात बळ आल्यावर आमची पाखरे घरट्यातूनउडून गेली होती.

पुन्हा एकदा दोघेच होतो.

पुन्हा एकदा पाऊस होता.

पुन्हा एकदा छत गळत होतं.

तेच टपटपणारे थेंब नव्हते.   यंदा या अनिश्चित वातावरणात कोणी छताची दुरुस्ती करणार आहे नव्हतं.

नवा पाऊस पडणार होता.

मनाचा आभाळ स्वच्छ करणार होता. काऊच घरटं दुरुस्त होणारच होतं. तोवर आठवणींचे आगळेवेगळे थेंब टपटपत राहणार होते……. राहणार होते.

 

© सौ. सुनिता अनंत गाडगीळ

9420761837

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जेष्ठ नागरिक दिन ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

☆ मनमंजुषेतून ☆ जेष्ठ नागरिक दिन ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

(काही तांत्रिक अडचणीमुळे  ‘जेष्ठ नागरिक दिन,’ हा  लेख काल लागू शकला नाही. तो आज लावत आहोत. –  ब्लॉग संपादक)

आयुष्यात घडलेल्या घटनांच्या माध्यमातून मला जे काही शिकायला मिळाले किंवा समाजात इतर ठिकाणी पाहावयास मिळाले त्याचेच हे सार. .

एक पिढी आणि दुसरी पिढी. . .  दरम्यान कोसळून पडलेल्या पुलाप्रमाणे घडलेल्या घटनांवर आधारित. .

वार्धक्याने वाकलेल्या खांद्याविषयी. . ज्यावर बसून आपण अनेक गोष्टींचा मनमुराद आनंद लुटला. . कंपवायूने थरथरत असलेल्या हातांनी कधी काळी मुलांना हाताला धरून चालायला शिकविले पडता पडता सावरले त्या हातांनी. . . मुलांना शांत झोप लागावी म्हणून ज्या ओठांनी अंगाई गीत म्हटले. . . त्याच ओठांना आपल्या मुलांकडून “गप्प बसा,  एक शब्दही बोलू नका ” असा धमकीवजा आदेश मिळतो.  हे सत्य आहे. . .  पण जमाना बदलला आहे.  त्याच बरोबर जीवनही बदलले आहे. . .

आमच्या वयाच्या लोकांनी आठवावे? कसे आपण नात्यांमध्ये एकमेकांच्या बंधनात गुरफटलेलो होतो.  आई वडिलांच्या हसर्‍या चेहर्‍यात साक्षात ईश्वराचे रूप बघत होतो.  त्यांच्या चरणी स्वर्ग दिसत होता. . पण आताची पिढी जरा जास्तच हुशार झाली आहे.  आणि खरं सांगायचे झाले तर अगदी प्रॅक्टिकल झाली आहेत. . . आजकालची पिढी (मात्रं काही अपवाद आहे हं बरं ) आई वडिलांना शिडीसमान मानते.  शिडीचा उपयोग फक्त वर जाण्यासाठीच असतो असा त्यांचा झालेला गोड गैरसमज. . . शिडी जुनी झाली की इतर अडगळीच्या वस्तूंबरोबर ती सुद्धा अडगळीत जाते किंवा कधी जाईल याचा भरवसा देता येत नाही. . आपल्या संसाराच्या ह्या रहाटगाडयात मुलांना योग्य संस्कार देण्यात कुठे कमी पडलो की काय? असा प्रश्न उपस्थित राहतो किंवा कळत देखील नाही. .  असो. . . .

जीवन हे एखाद्या वृक्षासारखे असते.  आई- वडील हे काही कुठल्या शिडीच्या पायर्‍या नव्हेत.  तर ते जीवनाच्या वृक्षांचे मूळ आहेत.  झाड कितीही मोठे होऊ दे हिरवेगार राहू दे. . परंतू त्याचे मूळच कापून टाकले तर ते हिरवेगारपणाचच काय ?मग ते समूळ झाडचं नष्ट होईल.

मुलांच्या जीवनातील पहिले पाऊल उचलण्या मध्ये ते मदत करू शकतात तर तीच मुलं आपल्या वृद्ध आई वडिलांच्या लडखणार्‍या पावलांना सावरण्याचा प्रयत्न का करू शकत नाही?  आयुष्यभर आपल्या मुलांच्या सुखाची,  त्यांच्या आरोग्याची कामना करणारे,  त्यांच्या साठी कष्ट करणारे आई वडील या जगात कमी आहेत का? ज्यांच्यासाठी आपल्या आवडीनिवडीला तिलांजली देऊन त्यांना मोठे करणाऱ्या,  समाजात त्यांना मानाचे स्थान प्राप्त करून देणाऱ्या या आई वडिलांना आजच्या पिढीकडून किती उपेक्षा सहन करावी लागते/होते. त्यांना किती कष्टमय जीवन जगावे लागते.  आधार असूनही निराधार अवस्थेत रहावे लागत आहे.  आजकाल तर  असे चित्र पाहावयास मिळत आहे आणि पाहण्यातही आले आहे.  परंतू आजची ही पिढी हे विसरू पहात आहे कि आज ही स्थिती त्यांची झाली आहे तीच परिस्थिती उदया तुम्ही जेंव्हा वृद्ध व्हाल त्यावेळी तुमच्यावरही येणार आहे.

आपण देखील उद्या वृद्ध होणार आहोत.  आपल्यालाही प्रेमाची,  शारिरीक व मानसिक आधाराची गरज भासणार आहे. . . .  म्हणूनच म्हणते वेळीच सावध व्हा. . .

आपल्या वृद्धपकाळासाठी शक्यतो आधीपासूनच तरतूद करून ठेवा. . . जर आपण मुलांचे पालनपोषण करू शकतो तर स्वतःचे पालनपोषण शेवटपर्यंत नाही का करू शकणार?

असा मी मनाला विचारलेला प्रश्न. . . . पण त्याचे उत्तर मात्र अनुत्तरीतच. . .

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

9870451020

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक अविस्मरणीय अनुभव ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ मनमंजुषेतून ☆ एक अविस्मरणीय अनुभव ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

अविस्मरणीय प्रसंग –

हा प्रसंग आहे, नवसाक्षरांच्या मूल्यमापनाच्या समितीत मी होते आणि नवसाक्षरांचं म्हणजे प्रौढांच्या शैक्षणिक प्रगतीचं मूल्यमापन करत होते, तेव्हाचा. बहुदा 1994 हे वर्ष असावे.

मीरजेच्या वेगवेगळ्या भागात मूल्यमापनासाठी आम्ही जायचो. हे वर्ग संध्याकाळी भरायचे. मूल्यमापनाचे काम रात्री करावे लागे. समितीत आम्ही 8-10 जण होतो. शिक्षण विभागाची जीप साध्याकाळी सर्वांना घेऊन जाई. प्रत्येकाला एकेका गावात उतरवत. शेवटच्या गावात तासभर जीप थांबे व क्रमाक्रमाने सगळ्यांना घेऊन येई व घरोघरी पोचवलं जाई.

त्या दिवशी मिरज तालुक्याच्या पूर्व भागात आमचेमूल्यमापन होते. मी ठरलेल्या ठिकाणी उतरले. अरग, बेडगच्या पुढचं गाव होतं. गावात समितीचीच्या सदस्यांना सहकार्य करण्यासाठी सरकारी आदेश दिलेले होते. एका झाडाजवळ मला उतरवून जीप पुढल्या गावी निघाली आणि जोरात पाऊस सुरू झाला. तिथे बसलेल्या तिघांजवळ मी प्रौढशिक्षण वर्गाची चौकशी केली. तो तिथून दूरच्या वस्तीवर असल्याचे कळले. ‘तुम्ही म्हणत असात, तर जाऊ या’,  लोकांचा काही सहकार्य करण्याचा मानस दिसला नाही. तिथले लोक म्हणाले, या पावसात तिथे कुणी आलेले नसणार,’ मलाही तसंच वाटत होतं. वर्ग चालू नसेल, तर घरोघरी जाऊन  मूल्यमापन करावे, आशा आम्हाला सूचना होत्या. पण पावसानंतर इतका चिखल झालेला होता की चिखलातून त्या वस्तीवर जाणेही अवघड होते. दिवे गेलेले होते. सगळीकडे अंधार. काय करावे, या विचारात मी असताना तिथे मिरज तालुक्याचे तहसीलदार आले. ते गावात काही कामासाठी आले होते व मिरजेला घरी परत चालले होते. मी एकटीच बाई माणूस तिथल्या काही लोकांशी बोलते आहे असं बघून ते थांबले. पाऊस एव्हाना थांबला होता. मी त्यांना विनंती केली की ते मला घरी सोडतील का? कारण जीप येईपर्यंत कुठे कसे थांबावे कळेना. त्यांची मोटरसायकल होती. ते ठीक आहे म्हणाले. मी जीप आली की गेल्याचा निरोप द्या,  असं सांगून निघाले. त्यावेळी मोबाईल आलेला नव्हता. तिथल्या लोकांनी बला टळली म्हणून हुश्य केले असणार.

नाही म्हंटले तरी अनोळखी व्यक्तीबरोबर आपण रात्रीच्या वेळी निघालो आहोत. थोडीशी धडधड होत होतीच. रस्त्यात फारशी, का जवळ जवळ वाहतूक नाहीच. मला हिन्दी मराठी सिनेमातले, एकटी शिक्षिका किंवा नर्स निघाली आहे आणि तिच्यावर कसे, कसले प्रसंग ओढवतात, याची चित्रे मन:चक्षूंपुढे उभी राहिली.  वर्तमानपत्रातल्या बातम्या आठवू लागल्या.

वीसेक मिनिटांच्या प्रवासानंतर वाटेत एका ओढ्याचे पाणी रस्त्यावरून वाहत असताना दिसले. पाण्याला चांगलाच वेग होता. तो वेग पाहून मी त्यांना विचारले, मी खाली उतरून चालत येऊ का? ते नको म्हणाले. त्यांनी योग्य गतीने मोटरसायकल त्या फरशीवरील पाण्यातून बाहेर काढली. 4-5 मिनिटात आम्ही त्या पाण्यातून बाहेर पडलो. चालत येणंच जास्त धोकादायक होतं, हे माझ्या नंतर लक्षात आलं. त्या चार-पाच मिनिटात मला ओढ्यातून कुणी कुणी वाहून गेल्याच्या बातम्या आठवत होत्या. थोडं पुढे गेल्यानंतर त्यांनी मला सूचना दिली की मी काहीही बोलू नये. सुमारे पंधरा- वीस मिनिटे गेली आणि ते म्हणाले, आता आपण सुरक्षित ठिकाणी पोचलो आहोत. मागचा टापू हा दरोडेखोरांच्या हल्ल्यासाठी कुप्रसिद्ध होता. त्यानंतर आम्ही मिरजेत पोचलो. देवासारख्या धावून आलेल्या या तहसीलदारांनी मला सांगलीला घरी आणून पोचवले. या देवमाणसाचे नाव आज मला आठवत नाही, याची खंत वाटते.

 

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काळ आला होता पण ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ मनमंजुषेतून ☆ काळ आला होता पण ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

रोजच्यासारखीच मी बँकेत जायला निघाले होते. आदल्या दिवशी पित्ताचा प्रचंड त्रास झाल्याने खूप अशक्तपणा

जाणवत होता. पण किल्ल्यांची जबाबदारी असल्याने जाणे भागच होते. म्हणून टूव्हीलर ऐवजी रिक्षाने निघाले होते. एक दीड कि. मि. गेले असेन, आणि अचानक मला खूपच अस्वस्थ वाटायला लागलं. छाती जड झाली. कुणीतरी बरगड्यांची घट्ट मोळी बांधत आहे असं वाटायला लागलं. जीवाची घालमेल व्हायला लागली.

नकळत मी रिक्षाच्या सीटवरच आडवी झाले… परत उठत होते ..झोपत होते. माशासारखी तडफड व्हायला लागली. रिक्षा वाला पार घाबरून गेला. “परत” घरी सोडतो म्हणाला. पण परत जाईपर्यंत मी मरेन असं मला आतून तीव्रपणे जाणवत होतं. पुढे वाटेत एक नामांकित हॉस्पिटल असल्याचं आठवलं.

‘तिथे घेऊन चला’ म्हटल्यावर ‘रस्ता माहिती नाही’ म्हणत तोच रडवेला झाला. मग मीच कसातरी रस्ता दाखवला.

तिथे पोहोचताच तिथल्या मोठ्या लॉबीतून कशीबशी चालत मी रिसेप्शनपाशी गेले. तिथली मुलगी फोनवर बोलण्यात इतकी गुंग होती की तिने माझ्याकडे बघितलेही नाही. आता आधार घेत उभे राहणेही अशक्य होत होतं.

समोर एक स्ट्रेचर ट्रॉली दिसताच मी कशीतरी जाऊन त्यावर झोपले. काही मिनिटे मी तिथेच तडफडत पडले होते. तिथून चाललेल्या वयस्करशा दोन ‘ मावशींनी’ मला पाहिलं आणि पटकन ती ट्रॉली ढकलत मला आत कुठेतरी नेऊन ठेवलं.

शिकाऊ दिसणारे दोन तीन डॉक्टर्स तिथे बसलेले होते. वॉर्डबॉयने मला तिथल्या टेबलवर झोपवलं. माझी तळमळ जास्त वाढली होती. मग एक एक करत तिथला प्रत्येक जण घरचा, बँकेचा फोन नंबर विचारायला लागला.

‘आधी काहीतरी इलाज करा‘

असं शेवटी मी ओरडले, तेव्हा ऑक्सिजन मास्क लावला गेला यात किती वेळ गेला कोण जाणे. मग आमचे मॅनेजर सर्वात आधी तिथे पोहोचले.

कुठल्याशा फॉर्मवर त्यांनी सही केली, आणि ” काळजी करू नका” एवढेच बोलून, किल्ल्या घेऊन ते निघूनही गेले. पुन्हा मी सोडून सगळे शांत … एव्हाना माझा घसा आवळल्यासारखा व्हायला लागला होता. छाती-पाठ- मान गळच प्रचंड दुखत होतं. शुद्ध हरपेल असं वाटत होतं. मग त्यांनी मला एक इंजेक्षन दिलं, आणि स्ट्रेचर-ट्रॉलीवर झोपवून लिफ्टमध्ये नेले. लिफ्टमध्ये मला माझी बहीण दिसली आणि माझी शुद्ध पूर्ण हरपली.

संध्याकाळी कधीतरी मी शुद्धीवर आले….आणि सकाळपासून घडलेला एक एक प्रसंग मला आठवायला लागला. प्रत्येक प्रसंगात, माझं आयुष्य संपवायला आलेला काळ जाणवायला लागला.

पण तरी अजून मी जिवंत कशी काय होते?….. मग हळूहळू लक्षात यायला लागलं की…… काळ आला होता हे तर १००% सत्य होतं, कारण त्या अवस्थेत ते मला क्षणाक्षणाला जाणवत होतं. पण वेळ? ती नक्कीच आली नसावी. कारण ती आली असती ,तर त्याही अवस्थेत हॉस्पिटलमध्ये जाण्याची अंतः प्रेरणा श्री स्वामींनी मला दिलीच नसती. रिक्षावाला मला वाटेतच उतरवू शकला असता.

त्या दोन मावश्यांना माझ्याकडे लक्ष द्यावं असं वाटलं नसतं. जे एक अत्यावश्यक इंजेक्शन तेव्हा मला दिलं लं, ते केमिस्टकडून आणायला माझ्याबरोबर कुणीच नव्हतं हे लक्षात येताच तिथला वॉर्ड – बॉयरुपी देवमाणूस ट्कन जाऊन, त्या इंजेक्शनचे ४००० रू स्वतःच्या नावावर लिहायला सांगून, ते घेऊन आला नसता. अर्थात हे मला नंतर कळलं होतं……. आणि या सगळ्यांनी मिळून, काळ बरोबरच घेऊन आलेल्या त्या वेळेला भक्कमपणे अडवून गदी वेळीच परतून लावलं होतं, म्हणून मी जिवंत राहिले होते…..त्या सर्वांची मी आजन्म ऋणी आहे.

दुसऱ्या दिवशी डॉक्टर तपासायला आले तेव्हा अगदी गंभीरपणे म्हणाले की” अजून अर्धा तास उशीर झाला असता तर यांचं काही खरं नव्हतं”……. आणि त्यांच्या त्या बोलण्याने मला मात्र तेव्हा नकळतच हसू आलं होतं.

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

पत्ता : ४, श्रीयश सोसायटी, ५७१/५७२, केंजळे नगर, पुणे  ४११०३७.

मोबाईल: ९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print