मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अहंकार ☆ डाॅ मेधा फणसळकर

डाॅ. मेधा फणसळकर

 ☆ मनमंजुषेतून ☆ अहंकार ☆ डाॅ मेधा फणसळकर ☆ 

मनुष्याला ‛मी’ पण मिळवून देणारा सार्थ शब्द म्हणजे ‛अहंकार’! मनुष्य हा बुद्धिवादी प्राणी आहे. म्हणूनच इतर पशु- पक्ष्यांपेक्षा तो वेगळा गणला जातो. आपल्या भावना तो आपल्या संवादातून , कृतीतून व्यक्त करु शकतो. म्हणूनच  जिथे सुख आहे तिथे दुःख, जिथे प्रेम आहे तिथे द्वेष आणि जिथे राग आहे तिथे लोभ हे हातात हात घालून असतात. त्यामुळेच जिथे स्वत्व आहे तिथे ‛अहम्’ असलाच पाहिजे असा अलिखित नियम आहे.

हा अहम् माणसाला कोणत्या स्तरापर्यंत पोहोचवू शकतो याची शेकडो उदाहरणे आपल्याला इतिहासात सापडतात. या ‛अहम्’ नेच हिटलरचा बळी घेतला. जग जिंकणारा सिकंदर या ‛अहम्’ पुढेच नमला. आपल्या मुझद्दीपणाने अनेक लोकांचा बळी घेणारा औरंगजेबाचा  अहम् चा तोरा  संभाजीराजांसारख्या राष्ट्रनिष्ठ व्यक्तीच्या देशभक्तीपुढे फिका पडला. मात्र अहम् ला जिंकणारे या जगात अजरामर झाले.स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ,जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, मदर तेरेसा…… किती नावे घ्यावीत तेवढी थोडीच आहेत.

खरं तर मनुष्य जन्माला येताच त्याचा ‛को$हम्’ (मी कोण?) चा प्रवास सुरु होतो. परंतु ‛अहम् ब्रह्मा$स्मि’ (मी ब्रह्म आहे) पर्यंत सर्वांचा प्रवास होतोच असे नाही. त्यामुळे हा अहम् च आपण कुरवाळू लागतो.

लहान असताना आपण पंचतंत्रात एक गोष्ट वाचली होती . त्यामध्ये बेडकीची पिल्ले गाय बघून येतात आणि आईकडे तिचे वर्णन करतात. ती केवढी मोठी होती हे समजण्यासाठी ती स्वतःचे शरीर फुगवून “ एवढी मोठ्ठी का?”असे विचारते. तेव्हा मुले म्हणतात,“नाही, त्यापेक्षा मोठ्ठी!” मग बेडकी आणखी अंग फुगवते. पुन्हा विचारते, मुले पुन्हा नकार देतात, पुन्हा ती फुगते व फुगत फुगत शेवटी मरुन जाते. त्याचप्रमाणे आपण या अहम् चा  फुगा फुगवू लागतो. आपल्याच कौतुकात आपण मग्न होऊन जातो. त्यामध्ये आपण इतरांचा बळी घेतो आहोत हे लक्षातच येत नाही.मात्र कधीतरी या भ्रमाचा भोपळा फुटतो व आपण जमिनीवर येतो. पण त्यावेळी हातात  बाकी शून्य राहिलेली असते.

पण अहंकार सोडणे म्हणजे स्वाभिमान सोडणे नव्हे. जिथे गर्वाची भावना येते तिथे अहम् वाढतो.मात्र आत्मसन्मान स्वाभिमान वाढवतो. आमचा ‛आयुर्वेद’ म्हणता म्हणता अमेरिकेसारखा देश आमच्या देशातील हळदीसारख्या औषधी वनस्पतींचे पेटंट मिळवते. जगात क्रिकेटमध्ये  अव्वल नंबरवर असणारे आम्ही वर्ल्ड कप क्रिकेटमधून बाहेर पडतो किंवा एक अहवाल ओबामाना सांगतो की त्यांच्या देशातील बरीच ‛ टॅलेंट’ ही भारतीय आहे ज्याचा उपयोग ते त्यांच्या देशाच्या प्रगतीसाठी करुन घेतात. किंवा आमच्या सहिष्णुतेला दुर्बलता समजून पाकिस्तान किंवा चीनसारखे देश आम्हालाच आव्हान देत घुसखोरी करतात.  या सर्व घटना खरोखरच आमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणाऱ्या आहेत. म्हणूनच आता केवळ अहम् कुरवाळण्यापेक्षा स्वाभिमानाची कास धरण्याची गरज आहे.

 

©️ डॉ. मेधा फणसळकर.

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विस्मरणात खरोखर जग जगते ☆ श्री एस्.एन्. कुलकर्णी 

श्री एस्.एन्. कुलकर्णी 

स्वपरिचय 

मी एस्. एन्. कुलकर्णी. मुळचा सोलापूरचा. शालेय आणि काॅलेज शिक्षण सोलापुरातच पूर्ण झाले. बॅंक ऑफ़ महाराष्टमधून ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालो. नौकरीनिमीत्त महाराष्टातील अनेक शहरात राहणे आले. तेथील समाजजीवन अनुभवता आले. लहानपणापासून वाचनाची आवड़ती  आजपर्यंत जोपासली आहे . आता पुणे येथे स्थिरावलो आहे.

☆ मनमंजुषेतून ☆ विस्मरणात खरोखर जग जगते  ☆ श्री एस्.एन्. कुलकर्णी ☆ 

जवळ जवळ ५३/५४ वर्षापूर्वीचा प्रसंग/घटना आहे ही. १९६७ मध्ये मी मॅट्रीकला शाळेत शिकत होतो. मार्च महीना होता. बोर्डाच्या परिक्षेचे दिवस होते. मॅट्रीकला आम्हाला त्यावेळी पुष्पा आगरकरबाई ह्या मराठी शिकवत होत्या. अतिशय छान मराठी शिकवावयाच्या. गद्य असो वा पद्य त्या अाम्हाला मन लावून शिकवायच्या. “मरणात खरोखर जग जगते” ही भा. रा. तांबेंची कविता त्यानी आम्हाला खुप छान प्रकारे शिकविली. या विषयावर बोर्डाच्या परिक्षेत निबंधसुध्दा येऊ शकेल अशी शक्यता बोलुन दाखविली. त्यामुळे त्यानी निबंधाचीपण तयारीपण करून घेतली.

बोर्डाची परिक्षा सुरू झाली. पहीलाच पेपर मराठीचा होता. पेपर सुरू झाला. ऊत्तरपत्रिका तसेच प्रश्र्नपत्रिकेचेही वाटप झाले. पहिलाच प्रश्र्न निबंधाचा होता.  चार पांच विषय होते आणि त्यामध्येच “विस्मरणात खरोखर जग जगते” हाही विषय होता. मुलांमध्ये चुळबुळ सुरू झाली. मी शेवटी वर्गावरच्या शिक्षकांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली.  छपाईची चुक असावी असेही मी बोललो. त्यानीपण ही गोष्ट गांभीर्याने घेऊन मुख्याध्यापकांच्या नजरेस आणून दिली. त्यावेळी मोबाईल फोन नव्हते.  एका शहारातून दुसर्‍या शहरात फोन लावायचा असेल तर फोन बुक करावा लागायचा. बराच वेळ लागायचा फोन लागायला. जवळ जवळ तासानी पुण्याला बोर्डाकडे फोन लागला. बोर्डाने स्पष्ट केले की निबंधाचे सर्व विषय बरोबर आहेत. त्यामध्ये छपाईची चुक नाही. हे समजताच विद्यार्थी नाराज झाले. आज  आठवत नाही पण कोणत्या तरी विषयावर निबंध लिहुन ऊत्तरपत्रिका शिक्षकांकडे दिली आणि मी बाहेर पडलो.

आज हा प्रसंग आठवला आणि या विषयाचे गांभीर्य लक्षात आले. बरे झाले मी त्यावेळी “विस्मरणात खरोखर जग जगते” या विषयावर निबंध नाही लिहीला. या विषयाला मी न्याय देऊ शकलो नसतोच.  आपल्या रोजच्या जीवनात असे अनेक कटु प्रसंग घडतात, दु:खद प्रसंग घडतात. प्रिय व्यक्तिंचा मृत्यु असो, अपघात असो, अपमानाचे प्रसंग असो अशा अनेक गोष्टी आपण जस जसा काळ सरत जातो तस तसे अशा गोष्टी आपण विसरण्याचा प्रयत्न करतो. खर तर अशा गोष्टी विसरल्या तरच आपण वर्तमानकाळात जगु शकतो. अशा दु:खद गोष्टींचे आपल्याला विस्मरण झाले तरच आपण रोजचे आयुष्य जगु शकतो.  वाईट गोष्टींचे विस्मरण हेच तर आपल्या रोजच्या जगण्याला अतिशय आवश्यक बाब आहे. भुतकाळाचे विस्मरण हे रोजच्या आनंदी जगण्याचा पाया आहे.  भुतकाळातील वाईट गोष्टी, दु:खद प्रसंग आपण विसरले पाहीजेत.  आत्ता मी या विषयावर इतका विचार करू शकलो.  मॅट्रीकमधील विद्यार्थ्यानी इतका विचार केला असता कां आणि विषयाला न्याय देऊ शकला असता कां? नक्कीच नाही.

 

©  श्री एस्. एन्. कुलकर्णी

वारजे, पुणे-४११०५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ थोडं स्वतःसाठी ☆ सौ. राजलक्ष्मी देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ थोडं स्वतःसाठी ☆ सौ. राजलक्ष्मी देशपांडे

 

“स्वत:साठी जगलास तर मेलास दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास” हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत असतो. ते पूर्णपणे खरं आहे. पण या वाक्याचा विपर्यास ही झालाय असं आपलं मला वाटतं.

आजूबाजूला काय दिसतं?

पूर्ण आयुष्य संसाराला, मुलांना वाहिलेली गृहिणी असते. तिचं समर्पण वंदनीय असतं. पण सतत दुसऱ्यांच्या म्हणजे मुलांच्या, घरातल्या संदर्भात जगण्याची तिला सवय होते. मात्र एका वळणावर मुलं स्वयंपूर्ण होतात. त्यांचं आईवर खूप प्रेम असलं तरी दैनंदिन आयुष्यात आईची गरज कमी होते. घरही स्थिरस्थावर होतं. मग मिळालेल्या या एवढ्या मोठ्या वेळेचं करायचं काय हा प्रश्न पडतो. शरीराची दुखणी, मनाचा एकटेपणा यांचा संबंध मग जुन्या घटनांशी, व्यक्तींशी, अगदी ज्यांच्यासाठी आयुष्य ओवाळून टाकलं, त्या

मुलांशीही जोडला जातो.

पुरूषांचं  हेच होतं. नोकरी, व्यवसायातले कष्ट संपतात. घरात राहण्याचा वेळ वाढतो. मग घरातल्या अनेक गोष्टी ज्या वर्षानुवर्षे चालू होत्या पण जाणवलेल्या नव्हत्या , त्या अचानक जाणवायला  लागतात. बारिक सारिक गोष्टीत हस्तक्षेप सुरू होतो. समाजातल्या,  राजकारणातल्या समस्यांवर कृतीशून्य चर्चा मोठ्या उत्कटतेने सुरू होते. आणि समवयस्कांखेरीज इतरांना त्यातली निरर्थकता जाणवल्यामुळे ती निरस वाटू लागते.

या दोन्ही मागचं कारण मला वाटतं, आपण नेहमी”दुसऱ्यांच्या संदर्भात”जगतो. “दुसऱ्यांसाठी”असं मी म्हणणार नाही. कारण दुसऱ्यांसाठी आपण जे करतो त्याचा आपल्याला आनंद होतो म्हणून करतो हे खरं आहे. त्यामुळं तसं आपण दुसऱ्यांसाठी काहीच करत नाही. दुसऱ्यांच्या संदर्भात करतो. तर आपण मूलतः आपल्यासाठी जन्मलो आहोत आणि आपल्यासाठी जगतो आहोत हेच आपण विसरतो.

आपण सवड असली तरी व्यायाम करत नाही,  फिरायला जात नाही. स्वत:साठी योग्य ते खात नाही.

मनाला विकसित करण्यासाठी ध्यान, स्वसंवाद,  विवेकपूर्ण विचारप्रक्रियेची समज याकडे लक्ष देत नाही. (अर्थात या विवेकाची सवय लगेच होत नाही. बऱ्याचवेळा अविवेकानं वागून झाल्यावर “अरेरे. . . चुकलं आपलं”असं वाटतं. )पण तेही ठीक आहे. निदान यामुळे दुसऱ्यांवर रागवण्याचा क्षणिक उद्रेक झाला तरी नाराजीची पुटं चढत नाहीत मनावर.

स्वत:साठी काही पाठांतर करण्यात आपण वेळ देत नाही. कारण पाठांतर वगैरे लहान मुलांशी संबंधित. . . आता या वयात मला काय गरज? असं वाटतं. पण वाढत्या विस्मरणशक्तीवर काही श्र्लोकांच्या पाठांतरासारखे इतरही स्मरणशक्तीचे व्यायाम उपयुक्त असतात.

यातल्या कशालाही पैसे लागत नाहीत. २४तासात कमी होत चाललेल्या आणि कधीकधी वाढलेल्यासुध्दा जबाबदाऱ्या सांभाळून यातलं सगळं नाही पण थोडं काहीतरी आपण करू शकतोच. पण असं फक्त स्वत:साठी काही करायची आपल्याला सवय नसते. या अर्थानं स्वत:साठी जगणं हे फार महत्त्वाचे आहे. पैसा उडवणं आणि गुंतवणं यात फरक आहे. तोच फरक स्वत:पुरतं जगणं आणि स्वत: साठी जगणं यात आहे असं मला वाटतं. स्वत:पुरतं जगताना तुम्हाला दुसऱ्याचा विचार करायची,  दुसऱ्यासाठी झिजण्याची गरज नसते. पण स्वत:साठी जगण्यासाठी दुसऱ्यांसाठीचं जगणं सोडायची गरज नसते. गरज असते ती फक्त सतत दुसऱ्यांच्या संदर्भात जगणं सोडायची.

हेच तर “कैझान”आहे जे आपण कंपन्यांमध्ये राबवतो पण स्वत:च्या  आयुष्यात कैझानची गरज आणि ते अत्यंत छोट्या गोष्टीतून कसं इंम्प्लिमेंट करता येईल याचा विचार करतच नाही. माझ्या posts हे माझं loud thinking ही असतं हं. . . कारण मीही प्रवासीच आहे की कैझानची.

© सौ. राजलक्ष्मी देशपांडे

मोबाईल नं. ९८५०९३१४१७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆  व्यूह आणि रचना ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ मनमंजुषेतून ☆  व्यूह आणि रचना ☆ श्री अरविंद लिमये ☆

मराठी भाषेच्या शब्दसौंदर्याइतकाच तिचे शब्दसामर्थ्य हाही सखोल अभ्यासाचा विषय आहे. व्यूह हा शब्द याचीच प्रचिती देणारा वाटतो. चांगले आणि वाईट असे दोन्ही अर्थ ल्यालेला हा शब्द!बेत, योजना, धोरण, युक्ति, हे जसे सकारात्मकता ध्वनीत करणारे अर्थ, तसेच कट, कारस्थान, डाव, डावपेच असे नकारात्मकतेच्या कृष्णछायाही याच शब्दाच्या. . ! युध्दात युध्दनीति, रणनीति ठरवताना शत्रुपक्षाच्या कसब/कुवतीचा अंदाज/अभ्यास जसा महत्वाचा तसाच त्यांच्या रणनीतिला छेद देण्यासाठी बुध्दीकौशल्यही तेवढेच आवश्यक. . ! हे बुध्दीकौशल्य अपरिहार्य ठरतं जेव्हा शत्रूपक्ष सर्वार्थाने प्रबळ असतो. ठाम निर्धार, खंबीर मन,  संघटन कौशल्यआणि उत्कट राष्ट्रप्रेम याच मुख्य भांडवलाला तीव्र बुध्दीमत्तेची जोड मिळाली आणि शिवाजीमहाराजांनी अतिशय प्रबळ मोगलसम्राटाशी लढताना युध्दनिती ठरवली ती स्वनिर्मित अशा ‘गनिमी कावा’या संकल्पनेनुसार. . !

व्यूह या शब्दाला रचनाकौशल्याची जोडही तेवढीच आवश्यक असते. विशेषत: बुद्धीबळासारख्या खेळात(लुटूपुटूच्या लढाईत)सुध्दा व्यूहरचनाकौशल्य अपरिहार्यच. . !

युध्दरचना, युध्दनीति यांची कसोटी लागते ती रणांगणावर हे कालपरवापर्यंतचं

वास्तव होतं. पण कालौघात व्यूहरचनेची गरज ही आज कुटुंबव्यवस्थेलाच खिळखिळी करु पहात आहे. सहजीवनातील अस्वस्थता, घटस्फोटांचं वाढत चाललेलं प्रमाण ही कौटुंबिक पातळीवरील छुप्या युध्दाचीच परिणती. या रणांगणावर व्यूह शब्दाचे नकारात्मक अर्थच ठळक होतात आणि ते सार्थ ठरवायला कट कारस्थानं प्रबळ होतात. टोकाचा आत्मकेंद्रीपणा नात्यातला गोडवा शोषून घेत स्वत; पुष्ट होत जातो आणि युध्दशस्त्रं परजली जातात. परस्पर सामंजस्य रणांगणावरील युध्दविरामासाठी अपरिहार्य असतं तसंच गृहकलहातही. देवाणघेवाण तिथल्यासारखी इथेही. पण इथे त्याची जाणिव  व्हायची तर ती उशीरा सुचलेल्या शहाणपणा सारखी नसावी हे आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण त्या युध्दांच्या बाबतीत रम्य वगैरे असणार्या ’ युध्दस्य कथा’ या प्रकारच्या युध्दात मात्र अतिशय क्लेशकारक असतात. . . !

 

© श्री अरविंद लिमये

सांगली.

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनोबल ☆ सुश्री अनुराधा फाटक

☆ मनमंजुषेतून ☆ मनोबल ☆ सुश्री अनुराधा फाटक

मन हे माणसाचे सहावे इंद्रिय आहे.नाक,कान,डोळे, रसना आणि त्वचा या पाच ज्ञानेंद्रियांना माणूस जेवढा ओळखतो त्याच्या पावपटही तो या सहाव्या इंद्रियाला ओळखत नाही.त्याचे सर्वात महत्वाचे कारण ही पाच ज्ञानेंद्रिये शरीरबाह्य आहेत आणि मन हे देहान्तर्गत आहे.जशी पाच ज्ञानेंद्रिये आपण दाखवू शकतो तसे मन दाखविता येत नाही.

मन दिसत नसले तरी सर्व इंद्रियामध्ये ते बलवान असते.सर्वावर त्याची सत्ता असते.जेव्हा माणसतली राक्षसी वृती जागृत होते माणसाचे मनोबल त्याला दुष्कृत्य करण्यास भाग पाडते.ही मानवी जीवनाच्या

विनाशाची सुरवातच म्हणावी लागेल.माणसाचे पहिले दुष्कृत्य म्हणजे सुधाकराचा एकच प्याला असतो.

हे लक्षात घेऊन आपण आपले मनोबल विधायक कामासाठी वापरले पाहिजे.विधायक कामासाठी मनही सदाचारी होणे महत्वाचे!

मन सदाचारी बनवायचे असेल तर आपल्या सहा शत्रूंना आपण जिंकले पाहिजे.हे सहा शत्रू म्हणजे काम,क्रोध, मद, मत्सर, लोभ! त्याना जिंकणे तसे सोपे नसते तरीही प्रतत्नपूर्वक सोपे करण्याचा प्रयत्न अशक्य नसतो. भूतकाळातील चांगल्या घटना, आठवणीना उजाळा देत आपण सकारात्मक विचार करू शकतो,आपल्या शत्रूंना आपल्यापासून दूर करण्याच्या प्रयत्नात हळूहळू यशस्वी होऊ शकतो.अशा यशस्वी होण्याने आपोआपच आपले मनोबल वाढते.

आनंद हे सुध्दा मनोबल वाढविण्याचे महत्वाचे कारण होऊ शकते.त्यामुळेच आपली आनंदीवृत्ती सहजपणे संकटाशी सामना करू शकते .प्रत्येकाने आनंदीवृत्ती जोपासून आपले मनोबल वाढविले जगणे सोपे होईल.अर्थात प्रत्येकाचे आनंद मिळवण्याचे मार्ग निश्चितच वेगळे असतात.

मनोबल वाढण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन फार महत्वाचा असतो.एखादा पाण्याने अर्धा भरलेला पेला बघताना तो अर्धा भरला आहे म्हणायचे की अर्धा रिकामा आहे म्हणायचे हे जसे त्या पेल्याकडं बघण्याच्या दृष्टीकोनावर अवलंबून असते तसेच मनोबलाचे असते.मानवी जीवनाच्या विकसासाठी सकारात्मक मनोबल उपयोगी पडते.जगायचेच आहे तर स्वप्नपूर्तीच्या मनोरथावर स्वार व्हावे म्हणजे जीवन यशस्वी होईल.

 

©  सुश्री अनुराधा फाटक

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सखी ☆ सौ. सुनिता अनंत गाडगीळ

☆ मनमंजुषेतून ☆ सखी ☆ सौ. सुनिता अनंत गाडगीळ ☆

कॅन्सर हॉस्पिटल मधला एक वॉर्ड. सेमी स्पेशल रूम मध्ये एका बेडवर मी आणि दुसऱ्या बेडवर कॅन्सर झालेल्या एक वयस्क बाई.

डोक्याचा गोटा, कातडी करपलेली. अंगातला तरतरीतपणा निघून गेलेला. अंगभर थकवा.डोळ्यावर ग्लानी. पुढची इंजेक्शन मागवण्यासाठी मी मोबाईल शोधत होते. माझ्या जवळ कोणी नव्हते. तो मोबाईल सापडेना.

त्यावेळी एक तरुणी माझ्याजवळ येऊन विचारत होती,” काय पाहिजे?” ती एक चिठ्ठी तिच्या हातात देत मी म्हटलं हे प्रिस्क्रिप्शन जरा धरुन ठेवा, जाईल कुठेतरी मोबाईलच्या नादात. “काकू, मी धरून ठेवते तुमच्या हातातली चिठ्ठी. तुमची औषध आणायची आहेत  ? कारण आईची आणायची आहेत.” ती तरुणी म्हणाली.

ती तरुणी या बाईला आई म्हणत होती. दोघींमध्ये कसलं साम्य दिसत नव्हत. हा विचार माझ्या मनात घोळत होता. ती तरुणी गेली. नंतर त्या बाई जाग्या झाल्या आणि आजूबाजूला बघून रडायलाच लागल्या. मी त्यांना विचारलं,” काय झालं रडू नका” त्या म्हणाल्या ‘आमची सून पौर्णिमा कुठे गेली ?मला घाई लागली आहे संडासला आणि उठता येईना.’ एवढं बोलण्यानंच त्या खुप  दमल्या. .दोघींची औषध घेऊन पौर्णिमा परतली होती. यावेळी अंथरूण घाणीने भरलं होतं. ते बघून तिने नर्सला बोलवलं .मला रूम बाहेर बसवलं आणि नर्स च्या मदतीने सगळे स्वच्छ केलं .

आता रडत म्हणाली,” काकू सॉरी हा .आता तुम्ही आत येऊन बसा. पहिल्यांदाच झालं असं आईला”. त्या हुंदके देत होत्या. त्यांचे मन हलकं झालं होतं. गदगदत होत्या. “तुझ्यावर काय वेळ आली ग बाळा “असे म्हणून त्या पुन्हा पुन्हा डोळे पुसत होत्या .”आई ,तू जर चांगली असतीस तर मला करायला लागलं असतं का ? तुला होणारे त्रास जास्त आहेत . नाहीतर तू तरी माझ्याकडून कधी असं करून घेतलं असतं का? तू त्रास नको ना करून घेऊ ,असं म्हणत पौर्णिमा त्यांच्या पाठीवरून हात फिरवत त्यांना धीर देत होती .धीर देऊन झाला .आता त्यांना गोळ्या द्या असे नर्स सांगून गेली.”मी आता तुझ्यासाठी जेवायला घेऊन येते पटकन “असं म्हणत गोळ्या च्या पाकीट मधल्या गोळ्या काढून बाहेर  पडत पूर्णीमा म्हणाली की “मी तुम्हाला काहीतरी खायला आणून देते.”

आईचा आवाज व्याकुळ झाला होता. “नको मला नको काही खायला.”

“आई कसं चालेल ?जेवणापूर्वी च्या दोन गोळ्या आहेत, जेवायला पाहिजे ,” पौर्णिमा म्हणाली.  “असं कर ,फार नको अर्धी किंवा चतकोर भाकरी खाऊन घे. त्यावर पोर्णिमा म्हणाली ,अर्धी भाकरी करणारी बाई कोण मिळते ते विचारून येते थांब.

पौर्णिमा खळखळून हसत म्हणाली .त्यावर आई हसत म्हणाली ,”हसू नकोस ग बाई. हसताना दम येतो बर का.  .नुसती निजून आहे ना मी. कमी खायला हवं ” त्या मुलीला आपलं किती करावे लागत हे जाणवल्याने आई त्यामुळे खरंतर तसं बोलत होती. सलाईन लावलेला हात सुजला होता आणि नात्याच्या ऋणातून गुरफटून जात मी त्यांच्यात अडकत होते. मघाच्या  नर्स आल्या .इंजेक्शन देऊन त्यांनी सलाईनचा स्पीड कमी केला, तेव्हा मात्र इतका वेळ कसाबसा धरून ठेवलेला त्यांचा धीर सुटला हात सुजला होता. त्या रडू लागल्या.

पूर्णिमाने त्यांचा हात सलाईन मधून सोडवायला लावला आणि सोडवलेल्या सलाईन काढलेल्या नळीला दाबून दाबून ती आईला हसवण्यासाठी विचारत होती “इथं दाबू. आता इथं दाबू ? ” सलाईन काढलेल्या आईच्या हातात घेऊन ती बसली होती..आता खरं तर ती आईची आई झाली होती. सासू-सुनेचं ते मैत्र बघून मला अपूर्वाई वाटत होती.

आताशा अहो जाहो सोडून अग जगं सासूला म्हटलं जातं. आपल्या  सासूची सखी झालेली ती सून मी कशी विसरेन? तिथल्या वास्तव्यात आमच्या खूप गप्पा झाल्या ते मैत्र मी आजवर जपून ठेवले आहे.

 

© सौ. सुनिता अनंत गाडगीळ

9420761837

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भक्तीसंगम ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆  मनमंजुषेतून : भक्तीसंगम ☆ श्री अमोल अनंत केळकर

मंडळी नमस्कार ??

आषाढ महिना संपत आला की धरण क्षेत्रातील पावसाने वाढलेल्या पाण्याच्या बातम्या लक्ष वेधून घेतात. अमुक पूल पाण्याखाली गेला, अमुक धरणं  क्षमतेच्या इतकी भरली , तमुक गावाचा संपर्क तुटला , या धरणातून अमुक तमुक क्षमतेचा विसर्ग चालू , हा बंधारा भरून वाहू लागला  इ इ.

अशावेळी  अनेक ठिकाणी  एक अपूर्व  दृश्य पहावयास मिळते.  यात प्रामुख्याने उल्लेख करता येईल तो म्हणजे नरसोबावाडीच्या  (जिल्हा. कोल्हापूर ) ” दक्षिणद्वार ” सोहळ्याचा कृष्णा आणि पंचगंगा  यांच्या संगमावर असलेले नरसोबावाडी हे एक पवित्र धार्मिक तीर्थक्षेत्र. कोल्हापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसाने पंचगंगा ( जणू  पाच भगिनी) दुथडी भरून वाहू लागते. त्याचवेळी सातारा, सांगली  जिल्ह्यातील पावसाने  महाबळेश्वर, कोयना पाणलोट क्षेत्र, कोयना धरणातील पाण्याचा उत्सर्ग, चांदोली धरणातील उत्सर्ग  यामुळे  कृष्णा, कोयना, वारणा या नद्या आनंदाने फुलून जाऊन पात्राच्या बाहेर पडून दक्षिण दिशेकडून नरसोबावाडीला  येतात आणि एका अनोख्या भेटीसाठी  ‘सप्त कन्या’ आणि त्यांची ‘कृष्णा माई’ सज्ज होतात.

या मिळून सा-याजणींची  “परब्रह्म भेटीलागी ”  अशी अवस्था होऊन जाते आणि मग या सगळ्याजणी  सरळ पोचतात ते  श्री नरसिह सरस्वती यांच्या ‘ मनोहर पादुकांवर ‘ जलाभिषेक करण्यासाठी “शक्ती आणि भक्ती  यांचा हा  अनोखा संगम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चा जयघोष करत मग इतर भाविक  या भक्ती संगमाचा “याची देही ” अनुभव घेऊन भक्तीरसात चिंब होऊन जातात.

असा हा विलक्षण  दक्षिणद्वार सोहळा, दरवर्षी पावसाळ्यात दोन – तीन वेळा तरी अनुभवास येतो.

नरसोबावाडीस पोहोचण्यापुर्वी  या सगळ्या नद्या वाटेत अनेक ठिकाणी   अनेक गावातील  घाटांवरच्या देवळातील ‘ चैतन्याला ‘  स्पर्श करून आलेल्या असतात. काही उदाहरणे द्यायची झाल्यास कृष्णेने  वाईच्या ढोल्या  गणपतीच्या गाभा-यात जाऊन घेतलेले दर्शन किंवा कृष्णेचेच  औदूंबरला दत्त गुरु चरणी घातलेले लोटांगण सांगता येतील.

अगदी असंच त्र्यंबकेश्वरहून उगम पावणारी ‘गोदा’ त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन नाशिकला  ‘प्रभू श्री रामचंद्रा ‘ चरणी लीन  झालेली पहावयास मिळते.  माऊलीच्या भेटीसाठी आसुसलेली ‘इंद्रायणी’ हे आणखी एक उदाहरण. अशी अनेक उदाहरणे आपणसा  इतरत्रही पहावयास मिळतात.

नद्यांना या ” परब्रह्म भेटीच्या ओढीचे”  मूळ  माझ्यामते  फार पूर्वी पासून आहे. जेंव्हा श्रावण कृष्ण अष्टमीला  छोट्या गोविंदाला घेऊन ‘ कंसा ‘ पासून सुरक्षीत स्थळी  नेण्यासाठी जेंव्हा वासुदेव निघाले होते. ‘यमुनेला’ ही वाटलंच की  या देवकी पुत्राच्या छोट्या पावलांना स्पर्श करावा असं.  सोमवती अमावस्येला  ओंकारेश्वराच्या दर्शनाहून परत बोटीतून येताना ‘श्री गजानन महाराजांच्या’ बोटीला खालच्या बाजूने छिद्र पडले. नावेत पाणी  जाऊ लागले. इतर भक्त मंडळी घाबरली पण इथे ही ‘नर्मदा’ “राजाधीराज योगीराज परब्रह्म गजानन महाराजांचे” चरण स्पर्श करण्यासाठी आली होती.

आषाढ महिन्यात पांडूरंगाच्या भेटीसाठी तहान भूक विसरून निघालेले वारकरी  आणि याच आषाढ – श्रावणात परब्रह्ममाच्या भेटी साठी निघालेल्या या नद्या  यात मला तरी काही फरक वाटत नाही .  हे कालचक्र, जीवन असेच प्रवाहित राहील जोपर्यत ‘भेटीची ही आस ‘ निरंतर राहील आणि  एकदा का ही भेट झाली की मग फक्त जाणवेल.

तुझा श्वास माझा ध्यास नुरे दुजे काही

तुझी भक्ती माझी मुक्ती भरे दिशा दाही

विश्व् आत्मरुपी  अवघे एकरूप झाले

परब्रह्म भेटी लागी धरेवरी आले

सूर सूर चैत्यनाचा रोमरोम झाले

???

देवा तुझ्या द्वारी आलो

 

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी कडून आम्ही कडे… ☆ प्रा.सौ. सुमती पवार

प्रा.सौ. सुमती पवार

☆ मनमंजुषेतून : मी कडून आम्ही कडे… ☆ प्रा.सौ.सुमती पवार ☆

सुशिला ताई आज सकाळ पासूनच हिरमुसल्या होत्या .चेहरा पडला होता. दुखावल्या सारख्या वाटत होत्या. ….

श्रीपतराव म्हणाले , काय ग ? काय झालं ? चेहरा का पडला तुझा ….?

खोदून खोदून विचारल्यावर म्हणाल्या,अहो , “आज काल घरात काही किंमतच राहिली नाही आपल्याला …? अगदी अडगळीत पडल्या सारखे वाटते पहा … कां ? काय झाले …श्रीपतराव म्हणाले… अहो, हल्ली घरात काय चालले आहे कळतच नाही…कोणी सांगत नाही की विचारत नाही…

श्रीपतरावांना हसू आले ..अस्सं होय …! ते म्हणाले , लग्न होऊन तू इथे शहरात आलीस नि …लगेचच तू स्वतंत्र झालीस , तेंव्हा तू विचारलेस का कोणाला काही .? मग मात्र त्या गप्प बसल्या …!

अगं .. स्वातंत्र्य सर्वांनाच हवं असतं नि आता आपला संसार तो कितीसा राहिला आहे..? काही कमी आहे का तुला कशाची ..? मग रहा ना सुखात ? का दु:ख्ख शोधतेस..?

खरं आहे …माणूस दु:ख्ख शोधतो. मी…मी…मी …मी….आणि फक्त मीच …!

मला विचारलं नाही … मला सांगितलं नाही

हा …”मी “ च आपल्याला संघर्षाकडे , सर्व-नाशाकडे घेऊन जातो. मी मोठा , मी प्रमुख , मी नेता ,मी कारभारी,राम ..राम राम..राम.. किती धुडगुस घालतो हा मी ?

माझे घर , माझी इस्टेट ,माझी बायको, माझी मुले… हा अहं इतका सुखावतो या शब्दांनी…की विचारू नका ….! पण आपण त्या मुळे किती दु:ख्ख मागून घेतो याची कल्पना

नसते आपल्याला …! पुराणात इतिहासांत खूप दाखले आहेत याचे…..! जग जिंकलेला सिकंदर त्या मुळे वयाच्या अवघ्या ३७ साव्या वर्षी सुख न भोगताच मरण पावला …!

काय मिळवले जग जिंकून त्याने …! घरा पासून जगा पर्यंत सर्वत्र हा मी आहे ….! आणि त्या मुळे संघर्ष वाढतो .मी आक्रमण करणार .. मी सत्ता गाजवणार ..जगभर या मी चा प्रताप आपल्याला दिसतो …

“म्हणून या मी चा आम्ही झाला पाहिजे”

अगदी बाल पणापासून या मी ची एवढी प्रचंड वाढ झालेली दिसते की , माझे खेळणे ,माझे दप्तर ,…मी देणार नाही …हा मी एवढा फोफावतो की,शेजारी राहून आपण एकमेकांचे शत्रू बनतो. सर्वत्र हेच चित्रं दिसतं.भिकाऱ्या पासून सम्राटा पर्यंत हा रोग पसरलेला आहे.आपण त्याचे दुष्परिणामही भोगत आहोत .

पण तरी ही या “मी” चे प्रस्थ कमी न होता दिवसेंदिवस वाढतंच चालले आहे.जगात कुठेही जा ..मी चा फणा उभारलेलाच असतो.

माझा धर्म , माझा देव ,माझे राष्ट्र ,माझे माझे आणि माझे… अत्यंत आत्मकेंद्री ,स्वार्थी असा हा मी हा अत्यंत घातक रोग आहे… हा मी सतत माणसाला पोखरत असतो. दुसऱ्याशी तुलना करायला भाग पाडतो.

आपल्या जवळ जे जे आहे त्याचा उपभोग न घेऊ देता हा मी सतत मागणी करत रहातो. हा मी… स्वत: ही जळतो व दुसऱ्यालाही जाळतो.

म्हणून तो आधी मनातून व जनातून हद्दपार झाला पाहिजे …ही आम्ही ची भाषा आपण घरातूनच निर्माण केली पाहिजे .आपले घर आपला समाज , आपले राष्ट्र ,आपले जग अशी भाषा जाणिवपूर्वक जन्माला घातली पाहिजे .. कारण नाती टिकली तर समाज टिकतो व समाज टिकला तरच एकराष्ट्र उभे राहते…

एका बेटा पेक्षा मुठीची ताकद फार मोठी असते. मग त्या वज्रमुठी पुढे एकसंघ भावने पुढे कुणाचे काही चालत नाही .. तर घरा पासूनच  या मी ला घालवून आमचा समाज निर्माण होईल आणि आमचा देश, आमचे राष्ट्र निर्माण होईल त्या दिशेने आपण प्रयत्न करू या …व आमचा देश , मग आमचे विश्व असा अभिमान बाळगू या ..सौहार्दाचा हात पुढे केल्यास काही ही अशक्य नाही..फक्त सुरूवात व्हायला हवी ती आपण करू …

वंदे मातरंम् कडून राष्ट्रागीता कडे व मग विश्व बधुत्वाकडे वाटचाल करू या …..

।।जय विश्व बंधुत्व ।।

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साक्षात्कार … ☆ श्री रवींद्र पां. कानिटकर

☆ मनमंजुषेतून : साक्षात्कार… ☆  श्री रवींद्र पां. कानिटकर 

आमच्या घराच्या बागेत आंबा, पेरु, नारळ, सिताफळ अशी अनेक फळझाडे आहेत. जास्वंदी,जाई, जुई,मोगरा, अबोली, गोकर्ण, गौरी अशी मनमोहक फुलझाडे बहरलेली असतात. फुलझाडांना येणाऱ्या कळ्या, हळुवार उमलणारी फुले, अंगणात दरवळणारा सुगंध तासनतास राहतो. सुगंधाने मन उल्हसित होतेच त्याबरोबर निसर्गाचे अनाकलनीय चमत्कार ही अनुभवायास येतात.

दरवर्षी मे महिन्यात अतिशय चविष्ट, मोठमोठाले भरपूर आंबे येतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला भरपूर पेरु, पावसाळ्यात सिताफळे, बारमाही नारळ अशा अनेक फळांची आमचे येथे रेलचेल असते. उन्हाळ्यात आंबे पाडाला आले की ते अलगदपणे काढून घरातच अढी घालण्याचा आमचेकडे जणू एक कार्यक्रमच असतो. त्यातल्या त्यात कच्च्या आंब्यांचे पन्हे,चटणी, चैत्रातील आंबा घालून केलेली हरभराडाळीची कोशिंबीर यांची चव जीभेवर बराच कळ रेंगाळते. हळूहळू, आंब्याच्या आंबट गोड वासिने घर भरून जाते. आंबे पिकत आले की ते आमच्या मित्रांना, गल्लीतील ओळखिच्या लोकांना तसेच गावातील नातेवाईकांना देण्याचा दरवर्षीचा आमचा रिवाज आहे. कुणाला आंबे द्यायचे चुकून विसरलेच तर ते स्वतः आवर्जून, अगदी हक्काने आंबे घेऊन जातात. आम्हालाही त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला आवडते.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आंब्याच्या झाडातून मोहोर हळुहळू डोकावू लागला. शिवरात्रीला शंकराला आंब्याचा मोहोर वाहून भरपूर आंबे येवोत अशी प्रार्थना केली जाते. वाऱ्याच्या झुळुकेबरोबर मोहराचा मंद सुवास संध्याकाळी घर भारून टाकतो.

परराज्यात राहणाऱ्या आमच्या मुलीने फारच हट्ट केल्याने व तिलाही एकटीला थोडी सोबत व्हावी या उद्देशाने आम्ही उभयता मार्च 2020 च्या पहिल्या आठवड्यात तिच्याकडे गेलो. माझी पत्नी थोडे जास्त दिवस तिथे राहणार होती. मी मात्र 15-20 दिवसांनी, म्हणजे मार्च 2020 अखेरीस घरी, सांगलीला परत यायचे असे नियोजन केले. परंतु, अचानक करोनाचे संकट सर्व जगभर पसरले. आपल्या भारतातही मग लॉकडाउन -1,  2,  3 असे करत लॉकडाउनची कालमर्यादा वाढतच गेली. तिकडे आंब्याचा हंगाम सुरु झाला. दरवर्षीचे घरच्या झाडाचे आंबे क्षणोक्षणी डोळ्यासमोर येऊ लागले. माझ्या 2-3 मित्रांना मी फोन केले. त्यांनी थोड्या थोड्या दिवसांनी, गेटवरुन चढून जाऊन, जमेल तसे आंबे काढून त्यांचा आस्वाद घेतला. काही मित्रांनी आंब्याचे लोणचे, चटणी, मुरांबा, साखरांबा असे अनेकविध पदार्थ केले आणि त्यांचे फोटो आम्हाला वॉटस्अप वर शेअर देखिल केले. आमचे घरी कुलुप असल्याने दरवर्षीची आंब्याची अढी यावर्षी नव्हती. आमच्या मित्रांनी काढलेले आंबे, आमच्या शेजाऱ्यांना, आमच्या नातेवाईकांना दिले. आंब्याची अप्रतिम चव व जिभेवर रेंगाळणाऱ्या अविट गोडीच्या रसभरीत वर्णनाचे फोनही आम्हाला आले.

करोनाची परिस्थिती थोडीशी आटोक्यात आल्यावर, कोव्हीड -19 स्पेशल ट्रेन सुरु झाल्यावर, सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन, जून अखेरीस, म्हणजे, तब्बल साडेतीन महिन्यांनंतर, आम्ही एकदाचे आमचे घरी, सांगलीला परतलो. एक दोन उन्हाळी व यावर्षी उशीरा सुरु झालेल्या  पावसामुळे अंगणातील फुलझाडे तरारली होती. जाई, जुई, मोगरा आदी फुलांच्या भरगच्च ताटव्यांनी व मंदधुंद सुगंधाने त्यांनी पहाटे आमचे गेटमध्येच स्वागत करून आमच्या प्रवासाचा शीण क्षणात घालवला.

थोडी विश्रांती घेतली. सकाळी उठल्यावर झाडांभोवतीचा पालापाचोळा गोळा केला,  नारळाच्या पडलेल्या झावळ्यांची आवराआवर केली. झाडांवर मायेने हात फिरवत, पाणी घातले. “घरचे चविष्ट आंबे यावर्षी आम्हाला चाखायला देऊ शकलो नाही” अशा अपराधी भावनेने आंब्याचे झाड, मान खाली घालून, जणू उदासवाणे आमचेकडे पहात असल्याचा भास झाला.

दरवर्षी पानापानात लपून बसणारे हिरवे, अर्धे पिवळसर आणि हळूवारपणे गडद पिवळे होणारे आंबे आठवले. दरवर्षीचे आंब्यानी लगडलेले झाडाचे मोबाइल मधील फोटो व आत्ता मात्र आंबेरहित झाडाचे काढलेले फोटो पाहताना मन हेलावून गेले.

गच्चीवरून आत्ता असेच काढलेले फोटो सहजच झूम करून पाहताना, पानाआड लपून बसलेला एक आंबा दिसला. अलगद हाताने त्याला खाली काढले आणि त्याचाही फोटो काढला.

फोटोत दिसणारा आंबा व आंब्याचे झाड याकडे पाहताना, आंब्याचे झाड आमच्याकडे पाहून गालातल्या गालात थोडे स्मित हास्य करत असल्याचा जणू भास झाला.

महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत बाजीप्रभूने पावनखिंड जशी एका हाती लढवली तशीच आमच्या आंब्याच्या झाडाने आम्ही परगावातून परत येइपर्यंत, तो एकमेव आंबा, जवळजवळ साडेतीन महिने ऊन, वारा, पाऊस या सर्वांशी प्राणपणाने झुंज देऊन, इतर सर्वांपासून, पानात जणू लपवून ठेवला होता.

तेवढ्यात, वाऱ्याची एक झुळुक आल्याने, फांद्या हलवून, पानांच्या सळसळीने, आंब्याचे झाड, आमच्या पुनर्भेटीने, त्याला झालेला आनंदच जणू व्यक्त करीत असल्याचा साक्षात्कार आम्हाला झाला.

© श्री रवींद्र पां. कानिटकर

– श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फुलपाखरू… ☆ सौ ज्योती विलास जोशी

☆ मनमंजुषेतून : फुलपाखरू… ☆ सौ ज्योती विलास जोशी

फुलपाखराचं  वेलींवर, फुलांवर बागडणं पाहणं हे नयन सुखकारक आहेच; पण त्याहीपेक्षा त्यांच्या पंखांवरची रंगांची पखरण न्याहाळण्यात मी जास्त रमून जाते.

लहानपणी फुलपाखरांच्या मागे धावून त्यांना पकडण्याचा माझा छंद आता मला खूप खटकतो.    कदाचित इतरांचे अनुकरण करण्याचा शिरस्ता मी मोडत नसेन इतकेच!

खूप छोटी छोटी झुंडीनं येणारी आणि डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच तोच दूर निघून जाणाऱ्या फुलपाखरांचं मला आकर्षण कधी नव्हतच. तेच जर एखादे मोठे फुलपाखरू फुलावर स्थिरावलं की मी हळूच बोटाच्या चिमटीत पकडत असेआणि बोटाच्या तळव्यावर उमटलेलं मीनाकाम तासन तास बघत बसे. फुलपाखरू केव्हाच स्वच्छंदी होऊन जायचं!!

काल सकाळी नेहमीप्रमाणे गणपती साठी जास्वंदीची फुले आणावीत म्हणून गच्चीवर गेले आणि माझं लक्ष वेधलं ते एका सुरेख अशा फुलपाखराने!! बऱ्याच दिवसानंतर फुलपाखरू दिसले आणि मी मोहरले.

जांभळा, पारवा,निळा, आकाशी,गडद निळा अशा निळ्या रंगांच्या विविध छटा आणि त्यात कोरलेली सुरेख नक्षी, तीही एक सारखी, दोन्ही पंखांवर मोजून मापून काढल्यासारखी जणू फ्रीहँड ड्रॉईंग! कमाल वाटली त्या विधात्याची!!

पिन ड्रॉप सायलेन्स म्हणतात ना इतकी निरव शांतता ठेवून मी पायरीवर स्थिरावले आणि फुलपाखराला न्याहाळू लागले मधु घटातील मध चोखता चोखता परागीभवनाचे काम नकळत सुरू होतं. जसं काही स्वार्था बरोबर परमार्थ!!!

उशीर झाला तसा मला खालून घरातून बोलावणे यायला सुरुवात झाली. मांजरीच्या पावलाने खाली उतरून “मी योगा करते आहे. मी ध्यान लावून बसले आहे. मला दहा मिनिटे त्रास देऊ नका.”अशी सर्वांना तंबी देऊन पुन्हा गच्चीवर आले.फुलपाखरू गोड हसत होतं…..

फुलपाखराला टेलीपथी झाली की काय? दहा मिनिटांनी ते उडून गेलं. ते पुन्हा येईल या आशेने तिथेच घुटमळले. पण व्यर्थ….

सकाळच्या कामाची लगबग सुरू होती.जास्वंद देवाला अर्पून मी स्वयंपाकाला लागले.अहो आश्चर्यम्! तेच फुलपाखरू माझ्या स्वयंपाक घरातील मनी प्लॅन्ट वर बसलेलं मला दिसलं.लगबगीने मी आरुषला म्हणजे माझ्या नातवाला बोलावून दाखवले. तोही बराच वेळ फुलपाखरू पाहण्यात रमला. नंतर ते सवयीप्रमाणे उडून गेले. पुन्हा दिसले म्हणून मीही भरून पावले.

दिवसभर त्याच्या निळ्या जांभळ्या पारव्या रंगाचा विचार घोळत होता. डोळ्यांनी तर ते रंग साठवूनच  घेतले होते. मिक्सिंगच्या टाक्याने अगदी डिट्टो फुलपाखरू विणायचा संकल्पही झाला मनोमन!..

संध्याकाळच्या चहासाठी स्वयंपाक घरात आले आणि एकदम दचकले! फुलपाखरू माझ्या हातावरच बसलेलं दिसलं मला. त्याचा अलवार स्पर्श जाणवला ही नाही. आरुष माझ्या पाशी उभा होता.त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीती अशा संमिश्र भावना होत्या.

जरासा हात हलला आणि ते उडून गच्चीच्या कठड्यावर जाऊन बसलं. डोळ्याची पापणीही न लवू देता आरुष एकटक त्याकडे बघत होता. माझ्यासारखाच तोही भावूक रात्री झोपेपर्यंत त्याच्या आणि माझ्यात फुलपाखरू सोडून कोणताही विषय नव्हता. आपल्या रंग पेटीतले सगळे निळे जांभळे रंग काढून तो फुलपाखरू आठवत होता.

माझ्यासारखाच फुलपाखरू चितारण्याचा संकल्प त्याने मनोमन केला असावा.

रात्री झोपतानाही आजी फुलपाखराची गोष्ट सांग असा हट्ट त्याने धरला.

“बाळा, मी तुला फुलपाखराचं छान गाणं म्हणून दाखवू का?”असे म्हणून मी ‘छान किती दिसते फुलपाखरू’ म्हणायला सुरुवात केली. ऐकता ऐकताच माझ्या पाखराच्या पापण्या मिटल्या……

सकाळी उठल्यावर मी गॅलरीचे दार उघडलं आणि खाली पडलेलं फुलपाखरू मला दिसलं. जवळचच कुणीतरी गेल्याच दुःख मला झालं. मी पटकन कुणी उठायच्या आत त्याची विल्हेवाट लावायचं पुण्यकर्म करून टाकलं.

मी विचार करू लागले की एरवी माणसांना घाबरणारा हा जीव आज माझ्या हातावर कसा काय येऊन बसला? मरणासन्न झालेलं ते माझ्या आश्रयाला आलं होतं. माझी मदत मागत होतं. मरण जवळ आलं आणि ते अगतिक झालं होतं. माझ्यावर इतका कसा त्याचा विश्वास? माझं मन त्याला उमगलं असेल का? माझ्या भावना त्याच्या पर्यंत पोहोचल्या असतील का? म्हणून तर त्याने इतक्या विश्वासाने माझ्या हाताचे चुंबन घेतलं असेल का? एक ना दोन हजार प्रश्नांचे काहूर माजले माझ्या मनात!

आरुष उठला, “आजी आज पण ते फुलपाखरू येईल ना ग?”

“हो,येईल ना! तू सगळं दूध पटापट पिऊन होमवर्क कम्प्लीट केलस तर येईल नक्की!!”

निरागस हा ही आणि निरागस ते ही…..

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

[email protected]

Mob.No. 9822553857

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print