मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणीतील पुणे: दिवाळी उत्सव ☆ संग्राहक – श्री माधव केळकर

? मनमंजुषेतून ?

 ☆ आठवणीतील पुणे: दिवाळी उत्सव ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

लहानपणी सदाशिव पेठेत असताना धमाल असायची… जागा भाड्याची असली तरी त्या छोट्याश्या जागेत खरे जीवन सामावले होते असे वाटते.  आता कितीही मोठी जागा , प्रत्येकाला स्वतंत्र रुम असली तरी जागा अपुरीच वाटते.  छोट्या जागेत माणसे जवळ होती. आता मोठ्या रूम्समुळे माणसांमध्ये दुरावा व भिंती निर्माण झाल्या आहेत.  

त्याकाळी परिस्थिती बेताची असली तरी सण आला की उत्साहाचे वातावरण असायचे.  त्यात दिवाळी सण म्हणजे सर्व सणांचा राजा. आमची सहामाही परीक्षा संपतच आलेली असायची. घरात एव्हाना सणाची तयारी सुरू झालेली असायची.  रेडीमेड कपड्यांची तेव्हा फारशी चलती नव्हती. कापड घेवून आधीच कपडे शिवायला टाकायचे.  प्रत्येकाचे कापड घ्यायचे व कपडे शिवायला टाकायचे ठिकाण ठरलेलेच असायचे.  मी माझे कापड बाळाराम मार्केट मधून घेवून लक्ष्मी रोड वर असलेल्या चार्ली मध्ये शिवायला टाकायचो. वर्षाला ठराविक कपडे फक्त दिवाळीलाच मिळायचे. आत्ता सारखे कधीही जावून कपडे आणायची परवानगी व पर्वणीही नव्हती. आई मंडई मधून चुरमुरे व पुढे रविवार पेठेतून चिवडा तसेच इतर दिवाळी पदार्थ बनविण्यासाठी सामान आणायची. दिवाळी पदार्थ रेडीमेड आणायची पद्धत नव्हती. आईच्या हातच्या पदार्थांचा एक वेगळाच स्वाद होता, मायेचा ओलावा होता. जेमतेम आर्थिक परिस्थिती आई सर्व खर्चाचे नियोजन कसे करायची तीच जाणे. दिवाळी पदार्थ बनवायला सुरुवात झाली की वाड्यातील प्रत्येक घरातून वेगवेगळ्या पदार्थांचा गंध यायला लागायचा. बायका घरात वासावरुन समजायच्या कोणाच्या कडे कोणता पदार्थ चालू आहे. बायका एकमेकींना मदतही करायच्या. दिवाळीच्या एखाद्या दुसर्‍या दिवस आधी नवीन कपडे आलेले असायचे. वाड्यात ते प्रत्येक घरात जावून दाखवायचा कार्यक्रम व्हायचा.  स्त्रियांची खरेदी व ती खरेदी एकमेकींना दाखविणे हा एक वेगळाच विषय, नव्हे वेगळे विश्व असायचे. वाड्यात विकायला आलेल्या विक्रेत्यापासून ते लक्ष्मी रोड वरील दुकानातील सेल् मधील खरेदी असा व्यापक विषय असायचा. फटाके  खरेदी हा पण स्वतंत्र विभाग असायचा. पुण्यात सारसबाग समोर फक्त फटाक्यांचे स्टॉल असायचे. फटाके सुद्धा ठराविक असायचे. लवंगी, पानपट्टी, मिरची,  नाग गोळी,  लक्ष्मी बॉम्ब,  सुतळी बॉम्ब,  चिमणी बॉम्ब, भुईनोळे , बाण यांचीच रेलचेल होती. टिकली रोल आणि पिस्तूल मिळाली तरी खूप भारी वाटायचे.  वाड्यात अभ्यंगस्नानासाठी पहाटेच नंबर लागायचे. पहाटे सर्वात पहिला फटाका कोण फोडतो यात शर्यत लागायची. थंडीने कुडकुडत असताना आई उटणे लावून गरम पाण्याने आंघोळ घालायची. मग नवीन कपडे घालून देवाला व घरातील मोठ्यांना नमस्कार करून फटाके उडवायला पळायचे. किल्ला ही तोपर्यंत तयार असायचा. फटाके उडवून झाले की घरी फराळ व्हायचा. मग आम्ही दिवसभर किल्ला, क्रिकेट,  पत्ते असा धुडगूस घालायला मोकळे. दिवाळीचे सर्व दिवस त्या त्या दिवसाच्या महत्वाप्रमाणे उत्साहात साजरा केला जायचा. वाड्यात मग एकमेकांची फराळाची ताटे एकमेकांत फिरायची. त्यात बरीच टीकाटिप्पणी व्हायची. पण एक वेगळीच गंमत व आपुलकी त्यात असायची. वडीलधारी मंडळी देवाला जावून यायची. बायकांच्या उत्साहाला तर पारावार नसायचा. दिवाळीचा शेवट दिवसात मग उरलेल्या फटाक्यांचे भस्म बनवायचे प्रकार चालायचे. किल्ल्या मधील बुरुज बॉम्ब लावून उडवून दिले जायचे.  पुण्यातील सर्व पेठांमध्ये एकच लगबग व उत्साह असायचा. पाहुणे घरी असतील तर मग मुलांचा प्रचंड धुडगूस चालायचा. दिवाळीचे दिवस सरले की मग मन उदास व्हायचे. प्रत्येकजण हळूहळू आपापल्या कामाला लागायचा. पाहुणे त्यांच्यात्यांच्या गावाला रवाना व्हायचे. 

आता मोबाईल आले. आता कोणाकडे यायची जायची गरज नाही. सर्व फोन कॉल,  video कॉल नाहीतर whatsapp मेसेज वर होवून जाते. महागाचे फटाके उडवून सुद्धा आत्ता तशी मजा नाही,  नव्हे फटाक्यांना आता बंदीच आहे. फराळाची ताटे आता सोसायटी संस्कृतीत फिरत नाहीत. घरात वडिलधारे नाहीत,  नवरा बायको दोघे नोकरीला. आता सुट्टी मिळवायची हेच मोठे दिव्य. चितळे कडून अथवा ओळखीच्या बाईकडून पदार्थ विकत आणले म्हणजे झाले. कपड्यांचे नावीन्य नाही कारण आता येता जाता कधीही अथवा ऑनलाईन सुद्धा आपण कधीही खरेदी करत असतो. सर्वांकडे आता लक्ष्मी आहे पण लहानपणच्या जुन्या फोटोमधील लक्ष्मीची  प्रसन्नता आताच्या डिजिटल फोटो मध्ये जाणवत नाही. आठवणीतील पुण्याची  दिवाळी अजूनही मनांत घर करून आहे.

ले. – जितेंद्र भूस

संग्राहक – श्री माधव केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बदलती दिवाळी…. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? मनमंजुषेतून ?

☆ बदलती दिवाळी…. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

‘चला, उठा, मोती साबणाच्या स्नानाची वेळ झाली’ म्हणत येणाऱ्या छोट्या मुलाची जाहिराती टीव्हीवर दिसू लागली की दिवाळी जवळ आल्याची जाणीव होते.आणि तर्‍हेतर्‍हेचे सुगंध परिसरात दरवळू लागतात. सुगंधी तेल, साबण, उटणी यांचे वास नाकाला येऊ लागतात!

दिवाळीची चाहूल तर लागली! मनात असंख्य दिव्यांची आरास तयार झाली! आठवणींच्या पणत्या  तेल, वात घालून प्रज्वलित होऊ लागल्या! या पणत्यांच्या ज्योतींनी मन उजळून निघाले! त्याचा प्रकाश मनभर पसरला! पुन्हा पुन्हा आठवू लागल्या त्या सोनसळी दिवाळ्या!

आमच्या लहानपणी आता सारखा लखलखाट नसला तरी मांगल्याने, पावित्र्याने भारलेली दिवाळी असे. पहाटेच्या वेळी विठोबाच्या, दत्ताच्या देवळात काकड आरतीचे प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळायचं.. कोजागिरी पौर्णिमा आली की दिवाळी जवळ आल्याची जाणीव होत असे.बोचरी थंडी पहाटे अंगात शिरशिरी आणायची पण तो गारवा सुखद वाटायचा! घराघरातून स्वच्छता होऊन नवरात्र पार पडले की, बायका दिवाळीच्या तयारीला लागायच्या!

डबे घासणे, अनारसा पीठ करणे, चकली, कडबोळी ची भाजणी भाजणे ही कामे लवकर सुरू होत असत. दिवाळीची खरेदी फार मोठी नसे, तरीही खिशाचा परवानगीनुसार प्रत्येकी एखादा तरी नवीन कपडा आणि थोडेसे फटाके आणले जात! कधीतरी घरासाठी म्हणून काही खरेदी असे. दिवाळीची वाट पाहिली जायची ती फराळासाठी! लाडू, चिवडा, चकली, शंकरपाळी, करंजी या सगळ्याची सगळे कसे आतुरतेने वाट पाहत असायचे! आता फराळाचे पदार्थ बारा महिने मिळत असल्याने त्याचीं अपूर्वाई कमी झाली. दिवाळी अगदी उद्यावर आली की, दिवाळीचा पहिला फटाका कोण आणि किती वाजता लावणार याची चुरस असे. फटाके अंगणात उन्हात टाकलेले असत, कारण जेवढे सुके असतील तितके ते जोरात वाजत! दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे आकाश कंदील बहुदा मी घरीच बनवले जात. अंगणाच्या कोपर्‍यात मुलांची दगड, माती गोळा करून किल्ला करायची गडबड असे. त्यावर शिवाजी महाराज आणि मावळे कसे लावायचे याची जोरदार चर्चा सुरू असे. मुली अंगणात रांगोळ्या काढून वेगवेगळ्या रंगाने सुशोभित करत असत. सगळे वातावरण कसं चैतन्याने भारलेले असे. नवलाईने आणलेली सुगंधी तेलं, उटणे, साबण यांचे वास दरवळत असायचे. अशी ही दिवाळी आम्ही आमच्या लहानपणी अनुभवली!

आमच्या मुलांनाही अशीच दिवाळी अनुभवायला मिळाली!

दिवाळीच्या पहिल्या दिवशी लवकर उठणे, तेल लावणे, गरम गरम पाण्याच्या आंघोळी करणे आणि सर्वांना ओवाळणे हा कार्यक्रम असे.त्यानंतर नवीन कपडे घालून देवदर्शन व नंतर फराळ असे. एकदा का दिवाळी सुरू झाली की दिवाळीचे चार दिवस फारच भरभर जात असत!

लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज या काळात पाहुणे मंडळींची जा- ये असे. एकमेकांना फराळाची ताटे दिली जात. भेटवस्तूंची देवाण घेवाण होई. त्या निमित्ताने सगळीकडे आनंदाचे वातावरण असे.

पण गेल्या पंधरा-वीस वर्षात दिवाळीने थोडे वेगळे स्वरूप घेतले असे म्हणायला हरकत नाही. घरी फराळाचे पदार्थ करणे कमी झाले, त्यामुळे फराळाची ताटं शेजारी देण्याची पद्धत कमी झाली. दिवाळीमध्ये काही बदलही झाले. यानिमित्ताने काही सेवाभावी संस्था सुवासिक तेल, साबण, फराळाचे पदार्थ, मुलांसाठी खाऊ, फटाके अशा गोष्टींचे वाटप करीत असतात. दिवाळी पहाट गाण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच घरी दिवाळी न करता ट्रीपला जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दिवाळी अंकाची मेजवानी तर सुट्टीत मिळत आहेच. एकूण काय तर दिवाळीचे स्वरूप थोडे बदलले असले तरी दिवाळी आनंदमय आहे. रूटीनमध्ये बदल म्हणून आपण दिवाळीचा आनंद घेतो. दिव्यांच्या माळा आणि लायटिंग मुळे पणत्यांची शोभा कमी झाली.पण अजूनही तुळशी वृंदावना पुढे पणती लावणारी एक पिढी शिल्लक आहे,ती या बाहेरच्या झगमगाटापासून लांब शांतपणे तेवत असते. खरेदी बारा महिने होत असल्यामुळे दिवाळी खरेदी चे महत्व कमी झाले असले तरी सतत खरेदी करण्याचा उत्साह असलेला वर्ग आणि जे खरोखरच सणासाठी खरेदी करतात असा वर्ग बाजारात गर्दी करत आहे.

गेले एक-दीड वर्ष आपण सर्वजण करोनाच्या राक्षसाला तोंड देत होतो, त्यामुळे एकत्र येणे, सण साजरे करणे अवघड झाले होते.आता करोना चा प्रभाव जरी कमी झाला असला तरी अजूनही सर्वांनी काळजी घेणे आवश्यकच आहे. तरीही बाजारातली  गर्दी लोकांचा उत्साह वाढल्याचे दाखवून देत आहे.

रूटीनमध्ये बदल म्हणून आपण दिवाळीचा आनंद घेतो. आनंदाचा कोणताही क्षण मनाची दिवाळी साजरी करत असतो! दिवाळी आता उंबरठ्यावर आली असताना माझ्या मनात ती उजळू लागली आहे. अशीच आपल्या सर्वांची दिवाळी आनंदमय जावो हीच सदिच्छा!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शतक महोत्सवी ‘विलिंग्डन’ मधील माझी चार वर्ष.. भाग – 2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ मनमंजुषेतून ☆ शतक महोत्सवी ‘विलिंग्डन’ मधील माझी चार वर्ष..  – भाग 2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

(बुजणारी तीच मी आता धीट झाले होते.) इथून पुढे —-

वेगवेगळ्या खेळांसाठी नावे घेणे निवड करून टीम तयार करणे सामान्यांच्या वेळी हजर राहून खेळाडूंच्या गरजा  अशी अनेक कामे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊनही आवडीने व चोखपणे केली. गोरे सरही जिमखान्यातील गरजा अडचणी याबद्दल सतत चौकशी करायचे. प्रत्येक  टीम खेळायला जाण्यापूर्वी मीटिंग घेऊन स दिच्छा देत व सल्लेही देत त्याचप्रमाणे  विद्यार्थिनी सल्लागार पिटके बाई मार्गदर्शन करीत असत आमच्या खो-खो कबड्डी अथलटिक्सच्या टीम बरोबर परगावी जाताना कधी पिटके बाई कधी  पोंक्षे बाई कधी उत्तरा जोशी बाई कोणी ना कोणी अगदी मोकळ्या मैत्रिणी सारख्या असायचा खेळाडूंचे खाणेपिणे लागले खुपले अगदी जातीने पहायच्या. शिपाई मारुती तात्या सदा यांनीही उत्तम सहकार्य केलं मी एल आर झाल्यानंतर मुलींची कबड्डी आणि ग्राउंड टेनिसची टीम प्रथमच सुरू झाली या संबंध वर्षात मी स्वतःही अनेक खेळात घेऊन कॉलेज पातळीवर बरीच बक्षिसे मिळविली आत्मप्रौढीचा दोष पत्करून सुद्धा सांगायला अभिमान वाटतो की उंच उडी मध्ये सांगली झोनला पहिला नंबर आला आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या  पोर्च मधील बोर्डवर जेव्हा आपलंच नाव रंगीत अक्षरात पाहिलं आणि अभिनंदनाचा वर्षाव झाला तेव्हा झालेला आनंद शब्दात व्यक्त करता येत नव्हता जिमखाना डे म्हणजे आमचा मिरवण्याचा उत्साहाचा पर्वणी चा दिवस. बक्षीस समारंभाला कोणाला बोलवायचे याबाबत  प्रो. गोरे सर सर्वांची मते घ्यायचे व मिळून प्लॅनिंग करायचे.

कॉलेजचे गॅदरिंगही  धुमधडाक्यात  असायचे. त्यातील एक भाग सरप्राईज गिफ्ट असा असायचा एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाकडे सवयी कडे पाहून किरकोळ बक्षीस देत असत मी देहयष्टीने  खूप बारीक होते तरीही स्टॅमिना चांगला होता बऱ्याच खेळात खेळत होते मला नाव पुकारून स्टेजवर बोलावले गेले आणि डोंगरे बालामृत ची बाटली दिली हसत-हसत स्वीकारली सर्वजण खूप खूप हसले संपूर्ण वर्ष असच धामधुमीत गेलं अभ्यासाकडे लक्ष नव्हतं शेवटचे दोन महिने जोरदार अभ्यास केला लॉजिक आणि सायकॉलॉजी विषय खूप आवडायचे इंग्रजीच्या नातू सरांनी शिकविलेली ॲनिमल फार्म कादंबरी अजूनही विसरलेली नाही मी प्राणीप्रेमी असल्याने त्यातील सर्व प्राणी अजूनही डोळ्यासमोर येतात याच वर्षात हौशी मुलींनी बसविलेली बायकात पुरुष लांबोडा या एकांकिकेत गणू या शिपायाची विनोदी भूमिका करण्याची संधी मिळाली खूप खूप मजा आली त्या वेळी. एस वायच वर्ष अविस्मरणीय कसं गेलं

टी वाय च्या वर्षाची सुरुवात झाली. आणि आता हे कॉलेज सोडून जाणार या विचारांनी एक प्रकारची रुखरुख लागून गेली आता आपल्याला मैदानी खेळ पुढील आयुष्यात कधीच खेळायला मिळणार नाहीत  म्हणून भरपूर खेळून घेतल आणि बक्षीसही मिळविली माझा स्पेशल विषय अर्थशास्त्र असल्याने तीनही वर्ष आंबर्डेकर सरांच्या शिकवण्याचा लाभ घेता आला विनोद करत टोमणे मारत हास्याचे फवारे उडवत अशी त्यांची शिकवण्याची हातोटी अजूनही स्मरणात आहे सरांच्या तासाला पुन्हा बसण्याची संधी मिळावी असं अजूनही वाटतं सरांचा तास कधी संपला कळायचे ही नाही त्यांचा तास मात्र कधीच चुकवला नाही इंग्रजीचे बर्ट्रांड रसेलचे निबंध खूप कठीण होते समजायला. माझी मैत्रीण जुल्फिकार नाईकवडीने मला खूपच छान समजाविले आणि म्हणून मी पेपर लिहू शकले.

कॉलेजच्या आठवणी किती सांगू तितक्या कमीच एकदा आम्ही मैत्रिणी लेडीजरुमच्या पूर्वीचे मागील पायऱ्यांवर खात बसलो होतो गप्पा चालू होत्या आपण कॉलेजच्या जुबिलीला जमू तेव्हा कशा दिसत असू ग केस पिकले असतील मुलं असतील संसार असतील नवरे बरोबर असतील एक एक मत ऐकता-ऐकता हसून हसून पुरेवाट झाली एकदा रेल्वेचा संप होता बस लवकर मिळेना एकदमच ठरलं चालत जायचं का आणि खरंच सात आठ जणी चालत चालत आलो दुसरे दिवशी पाय उचलवेनात अशी स्थिती झाली पण त्यातही एक  थ्रिल होत मजा आली पुढे गॅदरिंग ला आम्हाला वाऱ्यावरची वरात असा फिश्पोंड मिळाला मिरज सांगली पॅसेंजर गाडी म्हणजे उत्साहाचा खजिना तीन महिन्याचा पासला चार रुपये आणि बसला एक महिन्याला अकरा रुपये दहा रुपयांमध्ये वर्षाचा कॉलेजचा प्रवास खर्च व्हायचा त्यामुळे रेल्वेला खूपच गर्दी असायची थर्ड क्लास लेडीज डबा म्हणजे गाणी बजावणी विनोद चेष्टा मस्करी वर्गात शिकविलेल्या विषयांवर चर्चा वाद-विवाद ठेवलेली टोपण नावे मजा मजा असायची पावसाळ्यात कित्येकदा वह्या पुस्तके साडीच्या निऱ्या पद सांभाळत धूम ठोकून गाडी पकडावी लागायची कधीकधी इंजिन ड्रायव्हर शिट्टी वाजवून मुद्दाम गाडी सुरू करत आणि थोडी पुढे नेऊन पुन्हा थांबवत असत. तेही विद्यार्थ्यांबरोबर एंजॉय करत असायचे.

विलिंग्डन मधील चार वर्षांचा काळ (१९६५–६६. ते १९६८–६९) हा झुळुझुळु वाहणाऱ्या निर्मळ कारंज्याचे तुषार झेलत कसा गेला कळलंही नाही कन्या शाळेतून बाहेर पडलेल्या लाजऱ्या बुजऱ्या मला कॉलेजनी बनवलं भरभरून शिकायला मिळालं अनेक अनुभव मिळाले यशाच्या आनंदा प्रमाणे कशालाही कसं तोंड द्यायचं हेही शिकविलं. अजूनही कधीतरी तीव्रतेने वाटत की कॉलेजमध्ये जाव त्या त्या वर्गात जाऊन बसावं ठराविक विषय त्या-त्या सरांनी शिकवावेत गप्पा माराव्यात खेळाव  स्टडीडीमध्ये बसून अभ्यास करावा रेल्वेची   न्यारी गंमत अनुभवावी निदान पुढील जन्मी तरी ते सत्यात उतरावं या चार वर्षांच्या छोट्याशा प्रवासात कोण कुठून आलं कसं आलं माहित नाही पण या प्रवासाच्या सूत्रातून आम्हा मैत्रिणींना  सख्यांना  शिक्षकांना एकत्र आणून सच्चिदानंद देण्याचच सृष्टीकर्त्याच  प्रयोजन असावं. या मुशाफिरीतील काही सहप्रवासी. काळाच्या पडद्याआड गेले काही अधूनमधून भेटतात कॉलेजच्या आठवणी गप्पा होतात अत्यानंद होतो काहीवेळ कॉलेजच्या वातावरणात गेल्याचा भास होतो. आणि मन प्रसन्न होत. आजही आम्ही मोठ्या अभिमानाने सांगतो,” आमचं शिक्षण  विलिंग्डन मध्ये झालंय”

समाप्त 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

( पूर्वाश्रमीची पुष्पा व्यंकटेश रिसबूड )

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शतक महोत्सवी ‘विलिंग्डन’ मधील माझी चार वर्ष.. भाग – 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ मनमंजुषेतून ☆ शतक महोत्सवी ‘विलिंग्डन’ मधील माझी चार वर्ष..  – भाग 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

नुकतीच सकाळ’मधे बातमी वाचली की विलिंग्डन कॉलेजला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत .तोंडून आपोआप उद्गार आले ” अरे वा, आमचं कॉलेज शंभर वर्षांचं झालं” असं म्हणत असताना मी आमच्या कॉलेजचा इतिहास आणि माझ्या कॉलेज जीवनाच्या चार वर्षांच्या भूतकाळात रममाण झाले.

दक्षिणा महाराष्ट्रात त्यावेळी उच्च शिक्षणाची सोय नव्हती. डी. ई. सोसायटीच्या कार्यकर्त्यांच्या मनात दक्षिण महाराष्ट्रात एखादे महाविद्यालय काढावे असा विचार आला शिक्षण दिल्याशिवाय त्यांच्यात जागृती निर्माण होणार नाही असा एक विचार होता सांगली मिरजेच्या परिसराची पाहणी करून सर्व दृष्टीने योग्य असा निर्णय घेण्यात आला

महाविद्यालयाला परवानगी मिळावी यासाठी त्यावेळेचे मुंबई प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन यांच्याकडे मंडळी गेली आणि विलिंग्डन यांनी अपेक्षेबाहेर मदत केली. अनेकांचा विरोध दूर करून महाविद्यालयाचा मार्ग मोकळा केला. तत्कालीन परिस्थिती त्यांच्या मदतीशिवाय हे महाविद्यालय निघणे शक्य नव्हते. म्हणून त्यांचेच नाव या महाविद्यालयाला देण्याचा निर्णय डी. ई. सोसायटी ने घेतला.२२जून१९१९ला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू  सर चिमणलाल  सेटलवाड यांच्या हस्ते विलिंग्डन महाविद्यालयाचे उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी उच्चारलेली  वाणी पूर्णांशाने खरी ठरली आहे. ते म्हणाले‌‌.‌ It is a great day for the southern  maratha country, for today this part of the country views the  birth of an institution, which has a great future and which will play an important part in the educational and political progress of the  southern maratha country.

१९६५साली मी मिरजच्या जुबिली कन्या शाळेतून अकरावी मॅट्रिक पास होऊन, प्री. डिग्री आर्ट्सला प्रवेश घेतला. साध्या कन्या शाळेतून एकदम एका भारदस्त, प्रतिष्ठित,नामांकित, अलौकिक आणि इतक्या मोठ्या कॉलेजमध्ये येताना थोडं काय, पण खूपच  गांगरायला  झालं. आमचा पी. डी .आर्ट्सचा ,सहा नंबरचा, मोठा वर्ग पूर्ण भरलेला असायचा. दोन लेक्चर्स मधील दहा मिनिटे म्हणजे धमाल असायची. कागदी बाण फेकण काय ,टोमणे मारणे काय, टोपण नावाने चेष्टा करणं काय, सगळाच गोंधळ असायचा. लेडीज रूमपासून वर्गापर्यंत किंवा रेल्वे स्टेशन पर्यंत आम्ही एकटी दुकटी कधीच जात नव्हतो. कायम ग्रुपनेच जायचो. कधी मुलांची बोलणं तर दूरच ,पण उगीचच एक भीती आणि संकोच मनात वाटायचा.

प्री.डिग्रीला असताना असणारे सरांचा भूगोलाचा तास खूप आवडायचा कारण तो माझा आवडीचा विषय होता आणि त्यात सर्वोच्च मार्गही मिळाले होते.  प्रिन्सिपल  मुगळी सरांनी शिकविलेली डफोडिल्स कविता अजूनही आठवते.

डफोडिल्सच्या  लाटांप्रमाणे ते स्वताही  डोलायचे. इंग्रजीचे खळदकर सरांची सुपरफास्ट गाडी वर्गात आल्यापासून सुरू व्हायची. संपल्यानंतरच थांबायची. आम्हा मराठी माध्यमातून आलेल्यांना.  सुरुवातीला ते डोक्यावरून जायचं. हळू हळू सवय झाली. आणि मग आवडायला लागलं.

त्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याने एन.सी.सी.  स्पोर्टस्  किंवा पी.टी. यापैकी एका प्रकारात भाग घेणे सक्तीचे असायचे. मला खेळाची आवड व अनुभव असून सुद्धा संकोच आणि बुजरेपणा मुळे खेळात न जाता एन सी सी मध्ये भाग घेतला निपाणीजवळ अर्जुन नगरच्या दहा दिवसाच्या  कंपने  खूप काही शिकविले . दहा दिवस कडक परेड फायरिंग रात्रीचे सांस्कृतिक कार्यक्रम हार्ड वर्क अनेक ओळखी जमवून घेण्याची वृत्ती आणि शेवटच्या दिवशीचा कंप फायर सगळा खूप छान अनुभव मिळाला. त्याचा पुढील आयुष्यातही उपयोग झाला.

प्रि डिग्री पास होऊन एफ वाय बी ए ला प्रवेश घेतला. आता बुजणे अनेक भीती थोडी कमी झाली. थोडा आत्मविश्वास आला. माझी खेळातील मैत्रीण शीलकरमरकरने खो-खो  सिलेक्शनसाठी माझं नाव दिलं. स्वत‌ःचा  स्पोर्ट्स ड्रेस घालायला लावून मला ग्राउंड वर घेऊनच गेली .एक दीड वर्ष खेळाची सवय मोडली होती. पण तरीही खो-खोच्या टीम मध्ये मी निवडले गेले आणि पुढील सामान्यांसाठी सराव सुरू झाला. मला मोठ्या कौतुकानं सांगावसं वाटतं की त्यावेळी विलिंग्डनची  बहुतेक प्रत्येक टीम सांगली दोन ला चॅम्पियन असायची. आता माझ्यातला संकोच भीती बुजरे पणा कमी झाला होता. शाळा सोडल्यानंतर पुन्हा खेळण्याची संधी मिळाली.खेळाची ओढ मुळात होतीच. ती आता जास्तच वाढली अभ्यासात कधी फर्स्ट क्लास वगैरे मिळाला नाही कुठे गच्चूही खाल्ला नाही. पांडवप्रताप नावाच्या विनोदी एकांकिकेसाठी विचारणा झाली आणि मी पटकन होकार दिला द्रौपदीची छोटीशी भूमिका पार पाडण्याची संधी आणि अभिनयाचा छान अनुभव मिळाला.

एस वाय बी ए ला प्रवेश घेतला संपूर्ण वर्ष खूपच धामधुमीत गेल. जिमखाना मॅनेजिंग कमिटीच्या निवडणुकीत जिमखाना विद्यार्थिनी प्रतिनिधी एल आर म्हणून मी निवडून आले आवडीचे आणि मानाचे स्थान मिळाले खूप खूप आनंद झाला त्याच बरोबर बऱ्याच जबाबदाऱ्याही आल्या.  बुजणारी तीच मी आता  धीट झाले होते.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सर्वपित्री ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ सर्वपित्री ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर ☆ 

आज सर्वपित्री अमावस्या. तिच्या घरचा म्हाळ . रिकाम्या भिंतीवर नजर खिळवून ती नुसतीच बसून होती . नेमकं आपल्याला काय होतंय हे तिचं तिलाही कळेना . डोळ्यातील पाणी खाली सांडू नये म्हणून चाललेला कसोशीचा प्रयत्न . 

कधीही न पाहिलेल्या सासू – सासऱ्या बद्दल तिला वाटणाऱ्या आपुलकीची आणि एकटेपणाची कुणीतरी चेष्टा करेल किंवा तिच्या त्या भावनेबद्दल शंका व्यक्त करेल या भीतीनेच ….तिने ही  तगमग कोणाजवळही बोलून दाखवली नाही   

तसं पहायला गेलं तर एकदा …. हो फक्त एकदाच…तिच्या आईजवळ बोलली होती ती हे सगळ.  

“इतरांना सासू सासरे असतात म्हणून अडचण आणि मला नाहीत म्हणून ”  

यानंतर तिच्या आईने तिला जे काही समजावलं . त्यानंतर हा विषय तिने कधीही कोणाजवळ ही काढला नाही . आभाळभर रिकामेपणा साचलेल्या लेकीच्या छपराला तिने कोणत्या शब्दात आसरा दिला हे फक्त त्या माउलीलाच ठाऊक . याच शब्दांच्या शक्तीवर आणि आधारावर सासू सासऱ्याविनाच सासर तिच्या लेकीने आजवर पेललंय . 

खर पहायला गेल तर जीव ओवाळून टाकावा इतका चांगला दीर आणि कधीही कोणाही जवळ तक्रार करू नये इतका गुणी नवरा साथीला होते तिच्या . पण म्हणतात ना ‘ज्याची त्याची दुखणी ज्याची त्यालाच माहित असतात . आणि ती एकट्यानेच सहन करायची असतात…करावी लागतात  ‘

कुणाच्या घरी कधी हळदी कुंकवासाठी ती गेली की कोपऱ्यात नटून बसलेल्या त्या घराच्या सासूबाईकडे बघून तिला अगदी हेवा वाटायचा . हळद कुंकू कुठल्या बोटाने लावावं ? नारळ ओटीत घालताना कसा घालावा ? विड्याच्या पानाचे टोक कोणत्या बाजूस अन देठ कोणत्या बाजूस असावं ? अशा बारीकसारीक गोष्टी हक्काने सांगायला तिच्याही घरी कोणीतरी जेष्ठ व्यक्ती असायला हवी होती अस सारखं वाटायचं . अंगणात एकट्याच खेळणाऱ्या तिच्या बाळकृष्णाला गोष्टी सांगायला , गालावरून हात फिरवत कडकड बोटे मोडायला त्याच्या वाट्याला आजी आजोबा असायला हवे होते हे जाणवायचं  

पण हे वाटण , जाणवण सगळ मनातल्या मनात . ओठांच्या पाकळ्या उघडून आजपर्यंत एकही शब्द बाहेर पडला नाही . तिचा हा संवाद एकटीचाच असायचा . स्वतःपुरता मर्यादित . “ओरडणाऱ्या का असेनात पण मला सासूबाई हव्या होत्या , ज्यांच्या नजरेला चुकून जरी नजर मिळाली तरी भीती वाटावी इतके कडक का असेनात पण मला सासरे हवे होते ” 

कधीतरी तिच्या माहेरवाशिणी मैत्रिणी एकत्र जमायच्या . त्यांच्या रंगलेल्या गप्पा ‘ सासू ‘ या विषयावर येउन नेहमी थांबायच्या . मग त्या एकमेकीना सांगत राहायच्या घराच्या ‘ त्या ‘ दोन व्यक्तींमुळे होणारी अडचण , त्रास , अवघडलेपणा …… आणि बरच काही . हिच्याकडे पाहून कुणीतरी अगदी सहज बोलून जायचं  “बरंय बाई  तुझ. हे असले प्रकार तुझ्याकडे नाहीत ” या वाक्यावर तिच्याकडे खोट्या हसण्याव्यतिरिक्त काहीही उत्तर नसायचं . ज्या भावनांचा कल्लोळ तिच्या मनात उठायचं ते वादळ तिच्या मैत्रिणींना समजणार न्हवत.     

मी ही सहजच केला होता आज तिला फोन . तिच्या पहिल्याच वाक्यात आवाज खोल गेल्याचा जाणवला . गळ्यात दाटलेल्या हुंदक्यामुळे तिला धड बोलताही येईना . “काय झालंय ग ???” न राहवून शेवटी विचारलंच मी . “आज सर्वपित्री ” इतकच बोलली ती यावर . 

तिला काहीही न समजावता मी फोन बंद केला . बाप्पाजवळ हात जोडून उभी राहीले आणि एकचं मागण मागितलं 

“हवं तर सगळ वैभव लुटून ने पण कोणाची जिवाभावाची माणसं नको नेत जाऊ– अशी,  ज्यांची जागा उभ्या आयुष्यात दुसर कुणीही नाही घेऊ शकत . “

मुर्तीतला देव मुका का असतो ?? हे आज कळले मला 🙂 

— अमृता आशिष पेडणेकर

संग्राहिका : सुश्री आनंदी केळकर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फ्रीझ इन्स्पेक्शन…प्रकाश तांबे ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ फ्रीझ इन्स्पेक्शन…प्रकाश तांबे ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

अत्यंत साशंक नजरेने, पत्नी घरात नसताना, मी आमच्या Fridgeची पहिल्यांदा आणि शेवटची झडती घेतली होती.

Fridge उघडताच आंब्याच्या पेटीत जसे वरवर चांगले आंबे रचतात आणि खाली गाळ भरतात तसेच वरच्या कप्यात पॕकबंद दुधाच्या पिशव्या, पातेल्यातले वापरातले दूध, लोणी, पनीर, प्लास्टिक कंटेनरमधे चिरून ठेवलेल्या दोन भाज्या व तत्सम ताजे पदार्थ पाहिल्यावर मी सुखावलो. 

परंतु गाफिल न रहाता खालच्या कप्प्यांकडे जरा आधिक बारकाईने बघायचं ठरवलं. वरून अलगद झाकणाने  बंद केलेल्या पण ओसंडून वहाणा-या  विविध आकाराच्या बऱ्याच  वाट्या आणि दोन तीन पातेल्यांनी माझे दाटी वाटीत का होईना, पण सर्व प्रथम, जोरदार स्वागत केले. तेलाची तीन चार लसणीच्या पाकळ्या शिल्लक असलेली तळाला गेलेली फोडणी, मळलेल्या कणकेचा गोळा, एक दोन दिवसापूर्वी केलेल्या पावभाजीसाठीचा कांदा व लिंबाच्या फोडी व विरजणासाठी संभाळून ठेवलेले दही वगैरे कॉमन पदार्थ आढळले. यात दडलेल्या मालाला काळाचे बंधन नसते कारण expiry date चे बंधन तो जुमानत नाही. कंझमशन रेटही खूप हाय असतो.

परंतु त्याच बरोबर, एक दोन दिवसापूर्वीच्या उरलेल्या तयार भाज्याही झाकणीखाली आपला केंव्हा नंबर लागेल या विवंचनेत पडून राहिलेल्या आढळल्या आणि हळूहळू मला आमच्या घरी वारंवार होणाऱ्या  पराठे वा सँडविचेसचे कोडे उलगडत गेले. ओलसर भाज्या पराठ्यासाठी आणि कोरड्या भाज्या सँडविचेस साठी असे त्यांचे ढोबळ वर्गीकरण असते. 

दुपारचे टाइमपास कुकरी शो बघणे हा केवळ वरवरचा दिखावा असून शेवटी आईकडून परंपरेने शिकलेले पराठेच कामी येतात हेच खरे. शिवाय हेच पराठे न लाटता पोळपाटावर थापून मधे भोक पाडून तूप लोणी सोडले की थालीपीट म्हणून तुमच्या पानात अवतरू शकतात. आहे की नाही मल्टी पर्पज युटिलिटी? 

कुकरच्या एका गोलसर भांड्यात शिजवून ठेवलेले दाट वरणही या गर्दीत होते. बहुदा पहिल्या कप्यातील पळीची फोडणी देऊन डाल तडका या नावाखाली येत्या एक दोन दिवसात ते माझ्या पानात अवतरणार होते.

अजून एक उभा गंज होता. हात लागताच त्यातले ताक जागे झाले आणि ढवळताच वर वर दिसणा-या पाण्याशी एकरुप झाले. शेजारीच पसरट पातेल्यात साईचे दही होते. खूप विचार केला पण कोणत्याही प्रयत्नाने ‘हि’च्या नकळत साय लाटणे अशक्य होते म्हणून नाद सोडला.

दारा मागच्या साईडच्या कप्यात विविध मसाल्यांची तयार पाकिटे त्यांच्या वापराच्या frequency प्रमाणे लावली होती. दुसर्-यात सर्व टाईपच्या सॉसच्या बाटल्या होत्या. काहींवर माझ्या हलगर्जीपणामुळे आलेले ओघळ दिसले ते पटकन ओल्या फडक्याने पुसून घेतले.

भाजीच्या कप्यात objectionable काहीच आढळलं नाही. गाजर, काकडी, टोमॕटो एकमेकांच्या साथीत ” मरेंगे तो साथमे ” असे म्हणत एकमेकांना कंपनी देत होते. डीप Fridgeमधेही एकदम सामसूम होती. सगळेच लांबच्या रेसचे घोडे air packed अवस्थेत उभे होते. Icecream container sealed होता. मी हताश झालो. तेवढ्यात एक काजू दिसला तो तोंडात टाकला Inspection fee समजून.

एवढ्यात ही आली आणि मी Fridgeचा दरवाजा पटकन बंद केला. तिच्या लक्षात आले आणि मी ‘त्यातला’ नसून सुध्दा तिने विचारले सोडा शोधताय का? मी माझे निर्दोशत्व सिध्द केलंच पण त्याच बरोबर एकही पदार्थ वाया न घालवता संसाराचा गाडा अविरत चालवणा-या तिचे व तिच्यासारख्या तुम्हा असंख्य गृहिणींचे मनोमन आभार मानले. 

ले. प्रकाश तांबे

8600478883

(Repost)

संग्राहक : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “यश ज्वेलर्स” चा शुभारंभ ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? मनमंजुषेतून ?

☆ “यश ज्वेलर्स” चा शुभारंभ ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆ 

आणि ……….

आणि तो दिवस उगवला, माझ्या यश ज्वेलर्स दुकानाच्या शुभारंभाच्या आधीचा एक दिवस– ०५ सप्टेंबर १९९८. अनंत चतुर्दशी. 

——सर्विसला असतानाच दुकानाची तयारी चालू होती  १ टनापेक्षा जास्त वजनाची समेरिका कंपनीची तिजोरी कोल्हापूरवरून येऊन  स्थानापन्न झाली होती. दुकानाचा लोगो तयार झाला.  फक्त १५ दिवस हातात होते. काम पटापट चालू होते. दुकानाचा शुभारंभ धर्मवीर आनंद दिघे साहेबांकडून करायचे  ठरविले होते– “ एक मराठी माणूस सर्व्हिस सोडून सोन्याच्या दागिन्यांचे दुकान चालू करतोय म्हणजे मी नक्कीच येणार आणि आशिर्वाद देणार “, अशी त्यांनी  ग्वाही दिली. ०६ सप्टेंबरला सकाळी १० वाजताची वेळ नक्की झाली. 

चार दिवस आधी सोन्याचे दागिने तयार होऊन हातात आले होते.  दुकानाच्या बोर्डावर पितळी धातूची अक्षरं असलेले “ यश ज्वेलर्स “ हे चमचमणारे नाव झाकून ठेवले होते. सगळे ठरल्या वेळेत आणि मनाजोगतेही होत होते. 

———आणि तो दिवस उगवला, आदल्या दिवशी दुपारी आम्ही पनवेलहून  सगळे दागिने आणून, नवीन तिजोरीत ठेऊन, तिजोरी नंबर -लॉकिंगने बंद केली, आणि जेवायला गेलो. परत आल्यावर दागिने भिंतीवरच्या ट्रे मधे लावून उद्याची रंगीत तालीम करायचे ठरविले. दागिने तिजोरीतून बाहेर काढण्यासाठी तिजोरीची चावी फिरवली, ठरलेले नंबर सेट केले आणि——-

———आणि जे काही घडले ते अक्षरशः अनाकलनीय होते. ती नवी तिजोरी जी गेले महिनाभर दिवसातून एकदातरी उघड -बंद करीत होतो, आजही सकाळपासून तीनदा उघड- बंद केली होती, ती तिजोरी उघडेना. पुन्हापुन्हा  प्रयत्न केला. परत परत नंबर चेक केले तरीही तिजोरी उघडेना. मी पुरता घामाघूम झालो होतो.  दुकान चालू होण्याआधीच स्वामींनी मला मोठ्या परीक्षेला बसविले होते.  दुपारचे चार वाजले.  डोळ्यात पाणी आले, नको ते विचार डोक्यात येऊ घातले. तिजोरी नाही उघडली तर उद्या दुकानाचे उदघाटन कसे होईल ? अनेक प्रश्न डोक्यात थैमान घालत होते. सगळे दागिने तिजोरीत अडकले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता उदघाटन होते. फक्त १८ तास हातात होते. जे काही करायचे ते लवकर करायला लागणार होते.  मी समेरिकाच्या  वर्कशॉपला  फोन केला. मालक पांचाळ फोनवर  होते. त्यांना तिजोरीचा गोंधळ सांगितला. त्यांनी दिलासा देत सांगितले—-’ फक्त मी सांगतो तसं करा.’ नंतर जवळ जवळ एक तास त्यांच्या सूचनांप्रमाणे मी तिजोरीचे नंबरलॉक  फिरवत होतो,  पण काहीच उपयोग होत नव्हता.. ते जे काही सांगत होते ते सगळे करून सुद्धा काहीच फरक पडला नव्हता.

———-आता संध्याकाळचे पाच वाजले.  पांचाळसाहेबाम्हणाले, “  घाबरू नका, मी लगेच  निघतो आणि पहाटेपर्यंत ठाण्याला येऊन तिजोरी उघडून देतो. “ तरीही माझी पायाखालची जमीन सरकली. तेव्हा कोल्हापूर- ठाणे  प्रवासाला  १०-१२ तास लागायचे . ते लगेच  निघाले तरी  ठाण्याला पोचायला त्यांना सकाळ होणार होती.  हतबलपणे फक्त वाट बघणे एवढेच हाती होते. मी पार कोसळलो होतो, रडत होतो. काही कारणास्तव जर सकाळी ते वेळेत पोचले नाहीत तर …. दुसरा काही उपायही दिसत नव्हता— फक्त वाट बघण्याव्यतिरिक्त.  पण माझे मन दुकान सोडायला तयार नव्हते. मी ठरविलेच होते — तिजोरी उघडल्याशिवाय घरी जायचे नाही. वेळ जाता जात नव्हता. मनाची चलबिचल चालूच होती. रात्री एक वाजता  पांचाळसाहेबांचा फोन आला– ” मी पुण्याला पोचलोय. सहा वाजेपर्यंत ठाण्यात येतोय “. जीवात जीव आला. आशेचे किरण दिसू लागले. आता सगळे व्यवस्थित होईल असा विश्वास वाटायला लागला . 

———– पहाटेचे  पाच वाजले. रस्त्यावर थोडी वर्दळ चालू झाली. लक्ष हातातल्या  घड्याळावर होते. सव्वासहा वाजले आणि पांचाळ हजर झाले. त्यांना बघून त्यांच्या रूपात स्वामीच आल्यासारखे जाणवले. त्यांनी आल्याआल्या आतमध्ये जाऊन कामाला सुरवात केली. मला वाटले होते की  ते जादूगारासारखे एका क्षणात तिजोरी उघडतील— पण नाही— अर्धा तास झाला त्यांचे काम चालूच होते. माझ्या मनात स्वामींचा जप चालू होता. एक तास झाला तरीही काही घडले नव्हते. मी येरझाऱ्या घालू लागलो. . मनात नको  नको ते विचार येऊ लागले आणि तेवढ्यात खट्क असा मोठा आवाज झाला—तिजोरी उघडली होती . मी देवाचे आभार मानले आणि लगेच उठून आत गेलो. पांचाळना नमस्कार केला. व्यवसायाच्या सुरुवातीलाच  एक महत्वाचा धडा मिळाला—–     कुठचीही समस्या कायमस्वरूपी नसते. संयम ठेवून समस्येला सामोरे गेल्यानेच त्याचे उत्तर मिळते.’

—–६ तारखेला ठरल्याप्रमाणे  १० वाजून १० मिनिटानी ‘यश ज्वेलर्स’ दुकानाचे उदघाटन झाले. मी तीन वर्ष जे स्वप्न बघत होतो ते जसेच्या तसे साकार झाले होते—-आणि  यश ज्वेलर्सचा यशस्वी प्रवास चालू झाला——

 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

मो. नं. ९८९२९५७००५. 

ठाणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शास्त्रीय जागर ….. डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे 

? मनमंजुषेतून ?

शास्त्रीय जागर ….. डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

“काय कटकट आहे!” म्हणत, पाय आपटत श्रुतिका आरतीला आली. तिच्या चेहेऱ्यावरचा त्रासिक भाव आईने टिपला होता. आरती झाल्यावर प्रसादासाठी पुढे आलेल्या हातावर चापट देत आई म्हणाली, “आता कशाला प्रसादाला पहिला नंबर? यायचं नव्हतं ना आरतीला?”

अर्धवट कळत्या, १३ वर्षे वयाच्या श्रुतिकाला हे पूजा, आरती, नवरात्र सगळं बोरिंग वाटत होतं. आज आईने तिला समजवायच ठरवलं. “काय गं, तुला माहित आहे का नवरात्र का करतात?” आई ने विचारलं. तशी ती रागाने म्हणाली, “त्यात काय, काहीतरी ऑर्थोडॉक्स रूढी, कुठे देवी पाहिली कोणी? पण म्हणे ९ देवींची पूजा असते. मम्मा , तू काहीही म्हण, मला पटत नाही हे.” “अगं पण तुला कोणी सांगितलं की देवींची पूजा करण्यासाठीच नवरात्र आहे असं. त्याला शास्त्रिय आणि वैचारिक दोन्ही base आहेत.ऑर्थोडॉक्स आहे की नाही तूच ठरव” आई म्हणाली. “हँ, त्यात काय शास्त्रीय? ” श्रुतिका

“बाळा, नवरात्र हे बी- बियाणांच testing kit आहे. पूर्वी आतासारखी खूप बियाणं किंवा खतं नव्हती मग सगळ्या प्रकारची धान्य थोडी थोडी टाकून त्याचं एकप्रकारे testing केलं जातं नवरात्रात की ह्यांच्यापासून पीक कसं येईल? ” “हो का? Interesting आहे. पण मग आताच का?” श्रुतिकाला प्रश्न पडला म्हणून आईला बरं वाटलं. “बरोबर विचारलं, अगं या दरम्यान रब्बी पिकांचा हंगाम सुरू होतो, आणि ती पिकं पाण्यावर वाढतात ना मग हा trial pack बरं का!” आईने उत्तर दिलं.

“wow, मम्मा, भारीच की, आणि लोकांनी ते मनापासून करावं म्हणून देवाचं नाव, हो ना?” श्रुतिका एकदम excite झाली होती. ” पण मग आई ते, तू जोगवा मागायला का पाठवते? मला नाही आवडत. खूप embrassing वाटतं” श्रुतिकाने आईला मनातलं सांगितलं. “हे बघ बाळा, मी म्हंटलं ना, वैचारिक पण पार्श्वभूमी आहे. जोगवा मागणे म्हणजे काय तर आपला वृथा अभिमान बाजूला ठेवून शरण जाणे. पूर्वी लोक ह्या मागितलेल्या जोगव्यावर पोट भरायचे. तुमच्या भाषेत ego बाजूला ठेवून गरीब लोकांची दुःख समजून घ्यायची. आता तुम्ही जाताच ना ते चॅरिटी का काय साठी पैसे मागायला? मग देवाच्या नावाने मागितलं तर छिद्र पडतं का अंगाला?”

“Right मम्मा, तो ‘फुलोरा’ का? त्यातली पापडी खूप आवडते मला.” श्रुतिकाचं डोकं आता शंकांनी भरलं होतं. आई हसून म्हणाली, ” किती चौकशा त्या! अगं , मी म्हंटलं ना, रब्बी पिकाचा हंगाम सुरू होतो, मग दिवसभर शेतात राबायचं तर घरी काहीतरी कोरडा खाऊ असावा, मुलंही खातात. ते तुम्ही evening snack म्हणतात ना, तेच! आणि हो तेच त्याकाळचे chatting चे साधन होते फुलोरा लाटायला एकत्र आलेल्या बायकांना! Live whatsapp! “आई, कसले हुशार होते गं  आपले पूर्वज! मग आता सांग, कुमारिकेची पूजा कशाला? आता मला का नाही बोलवत आणि, लहान मुलींनाच का?”

“वेडाबाई, प्रत्येक स्त्री मध्ये प्रचंड शक्ती आहे. ही देवीची रूपं त्याचीच जाणीव करून देतात, ती लहानपणीच करून दिली तर त्यांना गम्मत पण वाटते आणि आपण काही तरी भारी करू शकतो हे त्यांच्या मनावर ठसतं. पूर्वी, लवकर लग्न व्हायची, पाळी यायच्या आधीच, त्यामुळे कुमारिका ह्या छोट्याच असायच्या एवढंच! ते काय तुम्ही म्हणता ना toddler, teenager वैगेरे त्यांचं चार्जिंग गं” आई.

“आयला, सॉरी, म्हणजे कमाल ग आई. प्रत्येक दिवसाला आणि सणाला काहीतरी आधार आहे. आता last, ते धान का धाण म्हणजे तो तुरा लावून का जायचं सीमोल्लंघनाला?” श्रुतिकाची प्रश्नावली सम्पणार म्हणून आईने हुश्श केलं. “मी म्हंटल ना, testing kit मधलं कुणाचं बियाणं चांगलं आहे हे त्या दिवशी कळतं मग, तुमची काय ती pilot study गं!” श्रुतिकाच्या डोळ्यातली चमक आईला बरच काही सांगत होती. “आणि आई , मला माहित आहे, दसरा म्हणजे, आपल्यातल्या रावणाला किंवा दुर्गुणांना, रामाने म्हणजे सद्गुणांनी जिंकायचं आणि ते हृदयापासून करायचं म्हणून हृदयाच्या आकाराची आपट्याची पानं प्रतीक म्हणून लुटायची, बरोब्बर ना?”

“म्हणूनच तुला सांगते, भारतीय संस्कृती, right choice है बेबी.” आई

आज आईने सुप्त कल्पकता वापरून तिच्यातल्या सरस्वती आणि श्रुतिकामधल्या दुर्गाचा GBनवरात्रानिमित्त  शास्त्रीय जागर केला होता.

©️®️ डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर

संग्रहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जरा हे वाचून बघायचं का ? – डाॅ. प्रज्ञावंत देवळेकर ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून  ?

☆ जरा हे वाचून बघायचं का ? – डाॅ.प्रज्ञावंत देवळेकर ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

(घरचा साबण सोडा घेऊन जगाची धुणी धुण्यापूर्वी जरा हे वाचून बघायचं का?  डॉ प्रज्ञावंत देवळेकर यांचा महत्वाचा लेख ! कुणी पत्रकार काय म्हटला, आर माधवनने कसे चांगले संस्कार दिलेत मुलाला,पैशाचा माज वगैरे चर्चा करण्या आधी …जरूर वाचा——-) 

शहारुखच्या पोराचं सोडा,  हीच घटना त्याच्या करिअरसाठी लाॅंचपॅड ठरेल..

तुम्ही तुमच्या घरातल्या-आजूबाजूच्या मुलांशी यावर बोला आणि यावर त्यांची प्रतिक्रिया बघा..

‘लिया माल, व्हाट्स दी बीग डिल? क्रुझरपे वो क्या चाय पिने जायेंगा क्या?’ असं मध्यमवर्गीय घरातले आणि आर्यनपेक्षाही लहानं पोरं पटकन बोलतात किंवा फक्त सूचक हसतात..

हे सगळं “आपण नक्की कुठं चाललं आहोत?” असा प्रश्न नक्की निर्माण करतं..

वाईट याचं वाटलं की ‘त्यानं’ व्यसन करणं म्हणजे फक्त ‘सरड्याची धाव शेवटी कुंपणापर्यंत’ ठरलं..

इतकी सोपी व्याख्या मौजेची आणि नशेची? जी आहे बापाचा पैसा म्हणून विकत मिळते..

अडकवला कॅमेरा गळ्यात–धुंडाळलं जंगल–शोधली खेकड्याची नवीन प्रजाती—.याला म्हणतात ‘कैफ’ 

आर्यनची ‘बातमी’ झाली पण अगदी त्याच्याहून लहान शाळकरी मुलं कोणकोणत्या व्यसनात अडकली नाहीयेत हे विचारा..व्हाईटनर ही अगदी पहिली पायरी..

माझ्या एका शाळकरी पेशंटनं गावाहून येतांना बस डोक्यावर घेतली कारण काय तर त्याला पेट्रोल हुंगायचं व्यसन होतं..ड्रायव्हरला विनंती करत कसंबसं पेट्रोलपंपावर गाडी थांबवली आणि त्याच्या पालकांनी वीस रुपयात रुमाल पेट्रोलनं भिजवून घेतला आणि कसंबसं पुण्यापर्यंत आले..

मुळात संप्रेरकांमुळं या वयात व्यसनांना बळी पडण्याची शक्यता जास्त असते—

सुरुवातीला सहज गंमत म्हणून मुलं या व्यसनांकडं वळतात आणि नंतर ते व्यसन त्यांची गरज होते..मध्यंतरी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार एकदा का व्यसन लागलं की ७० ते ९० टक्के व्यक्ती ते सोडण्यास तयार नसतात..

निकोटिनशिवाय एमडी व मॅफ्रेडॉनसारख्या अमली पदार्थाच्याही विळख्यात तरुणाई सोबत आता शाळकरी विद्यार्थीही अडकलेत..

जेलच्या ‘आत-बाहेर’ होणारे काही पेडलर्स माझे पेशंट आहेत..

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘बुक’ या नावानं विद्यार्थ्यांमध्ये एक पावडर प्रसिद्ध आहे आणि याच वयोगटात केटामाईन, मॅजिक मशरूम यासारख्या अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे..

अगदी शाळकरी वयातली मुलं काय काय व्यसन करतात हे बर्‍याच जणांना सांगूनही पटणार नाही—–

ग्लू-पेंट-ड्रायक्लिनिंगचं केमिकल-बॉण्ड-आयोडेक्स-स्टिकफास्ट-फेविक्विक-गॅसोलिन-हेअरस्प्रे-डिओड्रंट-थिनर-नेलपेन्ट रिमूव्हर-आयोडेक्स-पर्मनंट मार्कर आणि काय नाही? यात आता मुलीही मागं नाहीत..

बरं हे पदार्थ घेण्याच्याही वेगवेगळ्या अभिनव पद्धती आहेत..

  • ‘डायरेक्ट अ‍ॅप्लिकेशन’ म्हणजे थेट नाकात किंवा तोंडात उडवणं, बोटाला किंवा शर्टाच्या कॉलरला लावणं, रुमालास लावून हुंगणं..
  • ‘बॅगिंग’-
  •  म्हणजे कागद किंवा प्लास्टिकच्या पिशवीत तो पदार्थ उडवून त्यातून नाकाने आणि तोंडाने हवा आत घेणं..
  • ‘हफिंग’ म्हणजे या पदार्थानं भिजवलेला कपड्याचा तुकडा तोंडात ठेवणं..
  • ’स्निफिंग’ म्हणजे तो पदार्थ ज्या कंटेनरमध्ये आहे त्याचा नाकानं वास घेणं..
  • जवळपास हजारो असे पदार्थ आहेत जे अश्या प्रकारे वापरले जातात..

या पदार्थात असणाऱ्या रसायनात ब्युटेन,क्लोरोफ्लूरो कार्बन यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश असतो ज्यामुळं थेट मेंदूला ‘किक’पोहोचते..

तुमच्या संबंधित-आजूबाजूच्या शाळकरी मुलांच्या कपड्यांवर पेंट किंवा ऑईलचे डाग असतील, ते जवळ आल्यावर एखाद्या केमिकलचा वास येत असेल,त्यांच्या तोंडाच्या आजूबाजूला चट्टे किंवा जखमा असतील,नाकातनं वारंवार पाणी वहात असेल, डोळे लाल दिसत असतील, नजर भिरभिरती असेल, नखांवर डाग असतील, स्वभाव चिडचिडा असेल, बोलण्यात अडखळत असतील तर आधी त्यांचे मित्र कोण आहेत याचा तपास करा, त्यांना विश्वासात घ्या..

प्रारंभी मौज वाटली तरी या सगळ्याचा परिणाम प्रामुख्यानं हृदय-त्वचा-पचन संस्था-श्वसनसंस्था-किडनी यासोबतच मेंदूवरही होतो..

ब्रेकिंग न्यूजचं काय? आज आहे.  उद्या दुसरी येईल.  पण या पिढीचं काय? यावर साकल्यानं कुणी बोलणार नाही हे सगळं जाणवलं म्हणून हा प्रपंच !

#ByPradnyawant 

©️ डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

संग्रहिका :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्टाॅप किपींग….. डाॅ.संजय सावंत ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

? मनमंजुषेतून ?

☆ स्टाॅप किपींग….. डाॅ.संजय सावंत ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

Stop keeping

काल सकाळी सकाळीच माझ्या एका मित्राने , डॉक्टर दीपक ने एक मेसेज पाठविला , 

Stop keeping your cloths & shoes for special occasion , Wear them whenever you can ,, 

Now a days being alive is a special occasion !!! 

आजच्या परिस्थितीत लागू पडेल असा किती सुंदर आणि अर्थपूर्ण मेसेज आहे बघा ,,, 

सणासुदीला किंवा लग्नसमारंभासाठी घालता येतील म्हणून तुमचे मौल्यवान कपडे आणि शूज  नुसते कपाटात ठेवून देऊ नका , आजचा दिवस तुम्ही जिवंत आहात हाच तुमच्यासाठी सर्वात मोठा सण व क्षण आहे ,,, 

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका वृद्ध दाम्पत्याकडे व्हिजिट साठी गेलो होतो,  दोघेही 80 च्या आसपास असावे , राहणीमान , कपडालत्ता यावरून अत्यंत गरीब वाटायचे , फी देतानासुद्धा घासाघीस करायचे , औषधे लिहून दिली तरी अर्धीअधिक आणायचे , कसली चैन नाही , कोणी नातेवाईकांचा येणं जाणं नाही , कधी चांगलंचुगल खाणं नाही  कि कपडा नाही परंतु असते एखाद्याची परिस्थिती नाजूक असं म्हणून मी दुर्लक्ष करायचो एक दिवस माझ्या व्हिजिट बॅगमध्ये प्लास्टिक चा एक मोठा बॉक्स होता रिकामा होत आला होता ,  बाबा मला म्हणाले डॉक्टर साहेब मला तो बॉक्स द्याल का ? मी लगेच त्यांना तो देऊन टाकला ,,, कशासाठी पाहिजे असं विचारताच थोडं गडबडून गेले पण बायको पटकन बोलून गेली ,  त्यांना 1000 च्या नोटा ठेवण्यासाठी पाहिजे , मी अचंबित निघताना पुन्हा म्हणाले , अजून एखादा असेल तरी पुढच्या वेळी द्या मला , यात बसणार नाहीत , त्यावेळी माझे व्हिजिट फी दहा रुपये होती   ती देण्यास देखील ते नाखुश असायचे , विचारांचं काहूर डोक्यात घोंघावत असतानाच गाडीला किक मारून घरी आलो ,,, 

दुसऱ्या दिवशी सकाळीच ओपीडी मध्ये शिरतो न शिरतो तोच कंपाउंडर म्हणाला सर काल सकाळी तुम्ही व्हिजिटला गेला होता ते आजोबा सकाळीच गेले ,,, पटकन माझ्यासमोर नोटांनी गच्च भरलेला त्यांचा तो प्लास्टिकचा बॉक्स आला ,,,  ना खुद खाऊंगा ना खाने दुंगा असं आयुष्य जगतच कसलाही उपभोग न घेता नोटांचा बॉक्स खाली ठेवून बाबा वर गेले होते , आपण अमर आहोत किंवा अजून खूप जगणार आहोत या भ्रमानेच ते गेले ,

मागच्या महिन्यात आईचे वर्ष श्राद्ध झालं तिच्याकडे भरपूर किमती साड्या होत्या , मोठी बॅग भरली होती , काहींच्या तर घड्या देखील मोडल्या नव्हत्या , परंतु ती नेहमी साध्याच साड्या वापरायची , अर्थात वयोमानाने विरक्ती आल्यामुळे असेल कदाचित परंतु या साड्यां मुळे  नीता व तिचा नेहमी वाद व्हायचा ,,  कशाला नुसत्या ठेवून दिल्या आहेत बॅगेत ,,,  कुणी बघितलं तर म्हणतील डॉक्टरांची आई असून कसल्या साड्या  घालते वगैरे वगैरे ,, मला कोण बघणार आहे , तिचे नेहमीचे उत्तर , जेवढ्या चांगल्या साड्या होत्या त्या गरजूंना देऊन टाकल्या , बाकीच्या साड्यांची बॅग तशीच पडून आहे !!

आपल्या वॉर्डरोब मध्ये अनेक नवीन साड्या , पॅन्ट शर्ट पडून असतात , एवढ्या भारी साड्या , शर्ट , पॅन्ट रोज वापरायला कशाला घालायचा म्हणून तशाच पडून असतात , कधीकधी त्या घालायच्या मुहूर्तही उजाडत नाही , आणि समजा लग्न समारंभ किंवा इतर सणासुदीला घालायच्या म्हटल्या तर त्याची फॅशन आउट डेटेड झालेली असते  , त्या योग्य वेळी वापरल्या असत्या तर त्याचा उपयोग झाला असता ,, कपड्यांच्या बाबतीतच नव्हे तर घरामध्ये अशा अनेक गोष्टी आपण नंतर वापरून असं म्हणत म्हणत कालबाह्य होऊन जातात व तशाच लोळत पडतात ,,, 

आपल्या आयुष्यामध्ये वस्तूंच्या बाबतीत जी गोष्ट घडत असते तीच आपल्या मनातील चांगल्या-वाईट विचारांच्या बाबतीत देखील घडत असते , बरेचदा आपल्या आयुष्यात येणारे  मित्र नातेवाईक कुटुंबातील सदस्य यांच्याबद्दल आपल्या मनात असणारा स्नेह , प्रेम , आपुलकी आपण आपल्या इगो किंवा संकुचित  वृत्तीमुळे बोलून दाखवत नाही , मग बरेचदा वेळ निघून जाते ,  कारण बोलण्यासाठी ती व्यक्ती उरलेली नसते , संचय वस्तूंचा असो वा मनातील विचारांचा , त्याचा योग्य विनियोग , वापर झाला नाही तर त्यांची किंमत शून्य होऊन जाते , तेव्हा मित्रांनो आजचा उगवलेला दिवस हाच आपल्यासाठी occasion असतो ,  त्याच्यावरच आपला अधिकार असतो ,  म्हणून तुमच्याजवळ असलेले मौल्यवान  ते  वस्तू वा विचार आजच वापरून टाका त्या आउट डेटेड होण्याअगोदर !!!

 

डॉ संजय मंगेश सावंत 

संग्रहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares