मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – २९ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – २९  ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

पत्रिका

ताई आणि संध्या दोघीही कला शाखेत पदवीधर झाल्या. दोघींनी वेगवेगळ्या विषयात पदव्युत्तर शिक्षणही घेतले. संध्याला मुंबई विद्यापीठाची फेलोशिपही मिळाली. माझ्या आठवणीनुसार ताईने एम. ए. ला सोशिऑलॉजी हा विषय घेतला होता आणि त्यानंतर तिला सचिवालयात चांगली हुद्देवाली नोकरी मिळाली. त्याचवेळी उपवर कन्या ही सुद्धा जोड पदवी दोघींना प्राप्त झाली होती. परिणामी आमच्या जातीतल्याच काही इच्छुक आणि एलिजिबल बॅचलर्सच्या कुटुंबीयांकडून दोघींसाठी सतत विचारणा होऊ लागली. काय असेल ते असो पण ताई मात्र याबाबतीत फारशी उत्सुक वाटत नव्हती. काही विचारलं तर उडवाउडवीची उत्तर द्यायची शिवाय आमचं कुटुंब हे व्यक्ती स्वातंत्र्य जपणारं असल्यामुळे आमचे आई पप्पा याबाबतीत तसे शांतच होते. मात्र संध्याचे वडील ज्यांना आम्ही बंधू म्हणायचो ते मात्र “संध्याचे लग्न” याबाबतीत फारच टोकाचे बेचैन आणि अस्वस्थ होते. “ यावर्षी संध्याचं लग्न जमलंच पाहिजे. ” या विचारांनी त्यांना पुरेपूर घेरलं होतं. संध्याचं लग्न जमण्याबाबत काहीच नकारात्मक नव्हतं. सुंदर, सुसंस्कारित, सुविचारी, सुशिक्षित आणखी अनेक “सु” तिच्या व्यक्तिमत्त्वाभोवती दिमाखदारपणे जुळले होते. प्रश्न होता तो तिच्याकडून होणाऱ्या योग्य निवडीचाच. अशातच कोल्हापूरच्या नामवंत “मुळे” परिवारातर्फे संध्या आणि अरुणा या दोघींसाठी लग्नाचा प्रस्ताव आला. घरंदाज कुटुंबातील, अमेरिकेहून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेला, भरगच्च अकॅडॅमिक्स असलेला, कलकत्ता स्थित, “युनियन कार्बाइड” मध्ये उच्च पदावर मोठ्या पगाराची नोकरी असणाऱ्या “अविनाश मुळे” या योग्य वराची लग्नासाठी विचारणा करणारा प्रस्ताव आल्यामुळे सारेच अतिशय आनंदित झाले.

रितसर कांदेपोहे कार्यक्रम भाईंकडेच (आजोबांकडे) संपन्न झाला. मुलगा, मुलाकडची माणसं मनमोकळी आणि तोलामोलाची होती. विवाह जमवताना “तोलामोलाचं असणं” हे खरोखरच फार महत्त्वाचं असावं आणि अर्थात ते तसं त्यावेळी होतं हे विशेष.

आतल्या खोलीत बंधूंनी पप्पांना सांगितलं की, ” मुलाच्या उंचीचा विचार केला तर या मुलासाठी संध्याच योग्य ठरते नाही का जना?” 

पप्पा काय समजायचं ते समजलेच होते. शिवाय त्यांना मूळातच अशा रेसमध्ये भाग घ्यायचा नव्हता. ते दिलखुलासपणे बंधूंना म्हणाले, ” अगदी बरोबर आहे, आपण संध्यासाठीच या मुलाचा विचार करूया आणि तसेही अरुला एवढ्यात लग्न करायचेही नाहीय. ”

बघण्याचा कार्यक्रम अतिशय सुंदर, आनंदात, खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. न बोलताच होकारात्मक संकेत मिळालेही होते. तरीही पत्रिका जमवण्याचा विषय निघाला. वराच्या माननीय आईने दोघींच्याही पत्रिका मागितल्या आणि या “पत्रिकेमधील कोणती जुळेल त्यावर आपण पुढची बोलणी करूया. ” असं त्या म्हणाल्या.

बंधूंचा चेहरा जरा उतरलाच असावा. पपांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. न बोलताच स्पर्शातूनच सांगितले, “काळजी करू नका. होईल सगळं तुमच्या मनासारखं. ”

मी त्यावेळी प्रतिक्रिया देणे हा कदाचित उद्धटपणा ठरलाच असेल पण तरीही मी म्हणालेच, ” इतकी वर्षं अमेरिकेत राहणारा मुलगाही पत्रिकेत कसा काय बांधला जाऊ शकतो किंवा आईच्या विरोधात जाण्याचं टाळत असेल का ? निर्णय क्षमतेत जरा कमीच वाटतोय मला. ” परंतु “अविनाश मुळे” हा मुलगा सर्वांनाच खूप आवडला. माझ्या त्यावेळच्या शंकेचंही निरसन कालांतराने झालंच. बाबासाहेब.. ज्यांना आम्ही संध्याच्या लग्नानंतर हे संबोधन दिले.. ते अतिशय उच्च प्रकारचं व्यक्तीमत्त्व होतं. त्यांचं आदरणीय स्थान माझ्या मनात कायमस्वरुपी आहे.

संध्याच्या चेहऱ्यावरचे त्यावेळचे अस्फुट, संदिग्ध भावही तिची पसंतीच सांगत होते. त्या काही दिवसांपुरता तरी “या सम हाच” हेच वातावरण आमच्या समस्त परिवारात होते. त्याच दरम्यान ताईने संध्याजवळ हळूच म्हटलेलं मी ऐकलंही, “तुझीच पत्रिका जुळूदे बाई! म्हणजे प्रश्नच मिटला. ”

पत्रिका संध्याचीच जुळली आणि घरात सगळा आनंदी आनंद झाला. लग्न कसं करायचं, कुठे करायचं, कपडे दागिने, खरेदी, जेवणाचा मेनु, पाहुण्यांचे स्वागत.. उत्साहाला उधाण आले होते. दरम्यान अविनाश दोन-तीन वेळा येऊन संध्याला वैयक्तिकपणे भेटलेही. एकंदर सूर आणि गुण दोन्ही छान जुळले. ताई मात्र प्रचंड आनंदात होती. नकारातही दडलेला हा तिचा खुला आनंद मला मात्र जरा विचार करायला लावणारा वाटला पण सध्या तो विषय नको. “संध्याचं लग्न” हाच आघाडीचा प्रमुख विषय नाही का? 

अवर्णनीय असा संध्याच्या लग्नाचा सोहळा होता तो! सनईच्या मंगल सुरांसोबत संध्या मनोभावे गौरीहर पूजत होती. बाहेर दोन्ही वर्‍हाडी मंडळीत गप्पागोष्टी, खानपान मजेत चालू होतं भेटीगाठी घडत होत्या, जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता, नव्याने काही नात्यांचं पुनर्मिलन होत होतं. करवल्या मिरवत होत्या. पैठण्या शालू नेसलेल्या, पारंपरिक दागिने घालून महिला ठुमकत होत्या. नवी वस्त्रं, नवी नाती, नवे हितसंबंध, नव्या भावना. याचवेळी पप्पा हळूच गौरीहर पुजणाऱ्या सौभाग्यकांक्षिणी संध्याजवळ प्रेमाने गेले. संध्या आमची सहावी बहीणच. “मावस” हे नुसतं नावाला. लेक चालली सासुरा या भावनेने पप्पांना दाटून आलं होतं. डोळे पाणावले होते. संध्याने पप्पांकडे साश्रू नयनाने पाहिले. तिच्या नजरेत, ” काय पप्पा?” हा प्रश्न होता.

“ बाबी! या डबीत एक ताईत आहे लग्नानंतर तू तो सतत जवळ ठेव, नाहीतर गळ्यात घाल. तुझ्या सौभाग्याचं हा ताईत सदैव रक्षण करेल. ”

त्या क्षणी संध्याच्या मनातला गोंधळ पप्पांना जाणवत होता. “ पप्पा तुम्ही हे सांगताय? हा प्रश्न तिच्या ओठावर आलाही असणार. पप्पा एव्हढंच म्हणाले, ” बाबी! नंतर बोलु. तुझ्या वैवाहिक जीवनासाठी या बापाचे खूप आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. ”

संध्याचा पपांवर निस्सीम विश्वास होता.

तर्काच्या पलिकडच्या असतात काही गोष्टी खरं म्हणजे! पप्पांचा ज्योतिष शास्त्रावरचा सखोल अभ्यास होता. ते स्वतःही जन्मपत्रिका मांडत. आमच्या, आमच्या मुलांच्या ही पत्रिका त्यांनीच अचूक मांडल्यात पण तरीही भविष्य सांगण्यावर आणि मानण्यावर त्यांचा कधीच भर नव्हता. एकाच वेळी ते “ज्योतिष” या शास्त्राला मानत असले तरी ते त्यावर विसंबून राहण्याबाबत फार विरोधात होते. पत्रिका जुळवून लग्न जमवणे, कुंडलीतले ग्रहयोग, त्यावरून ठोकताळ्याचं चांगलं -वाईट भविष्य अथवा चांगल्यासाठीची व्रत वैकल्यं, वाईट टळावं म्हणून शांती वगैरे संकल्पनांवर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. Rule your stars.. असेच ते कुणालाही सांगायचे. मग अशा व्यक्तीकडून संध्याबाबतच्या या छोट्याशा घटनेचं कसं समर्थन करायचं? काय अर्थ लावायचा? 

त्याचं असं झालं.. डोंबिवलीच्या एका ज्योतिषांकडे( मला आता त्यांचं नाव आठवत नाही) “अविनाश मुळे” यांच्या पत्रिकेशी जुळतात का हे तपासण्यासाठी संध्या आणि अरुणाच्या पत्रिका आल्या होत्या. त्यांनी काही निर्णय देण्याआधीच बंधू त्यांना भेटले होते. गंमत अशी की हे डोंबिवलीचे सद् गृहस्थ आणि पप्पा बऱ्याच वेळा एकाच लोकल ट्रेनने व्ही. टी. पर्यंतचा आणि व्ही. टी. पासून चा (आताचे शिवाजी छत्रपती टर्मीनस) प्रवास करत. दोघांची चांगलीच मैत्री होती. त्या दिवशी पप्पांना गाडीत चढताना पाहून या सद्गृहस्थांनी पप्पांना जोरात हाक मारली, “ढगेसाहेब! या इकडे, इथे बसा. ” त्यांनी शेजारच्या सहप्रवाशाला चक्क उठवले आणि तिथे पप्पांना बसायला सांगितले.

“हं! बोला महाशय काय हुकूम?” पपांनी पुढचा संवाद सुरू केला.

“ अहो! हुकूम कसला? एक गुपित सांगायचंय. बरे झाले तुम्ही भेटलात. ”

मग त्यांनी विषयालाच हात घातला. “अविनाश मुळे” यांच्या पत्रिकेशी कुठलीच पत्रिका नाही जुळत हो! अरुणाची सहा गुण आणि संध्याची केवळ पाच गुण. पण श्रीयुत निर्गुडेंमुळे(बंधु) थोडा नाईलाज झाला. गृहस्थ फारच नाराज झाले होते. ”काहीतरी कराच” म्हणाले.

“ काय पंडितजी तुम्ही सुद्धा ? तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. बरं मग पुढे काय आता. ?”

“निर्गुड्यांना मी काहीच सांगितलेले नाही. हे बघा. पत्रिकेत मृत्यूयोग आहे. लग्न झाल्यावर आठ वर्षानंतर काहीतरी भयानक घडणार आहे पण ही पनवती, हे गंडांतर जर टळले तर मात्र उभयतांचा पुढच्या आयुष्याचा प्रवास अत्यंत आनंददायी आहे हे निश्चित. ”

“ म्हणजे सत्यवान सावित्रीची कलियुगातील कथा असेच म्हणूया का आपण?”

पप्पांना गंभीर प्रसंगी विनोद कसे सुचत?

“ ढगे साहेब हसण्यावारी नेऊ नका. माझं ऐका. मी एक ताईत तुम्हाला देतो. तेवढा कन्या जेव्हा गौरीहर पुजायला बसेल ना तेव्हा तिच्या हाती सुपूर्द करा किंवा तिच्या गळ्यात तुम्ही स्वत: घाला. उद्या आपण याच संध्याकाळच्या सहा पाचच्या लोकलमध्ये नक्की भेटू. ?”

पप्पांनी फक्त त्या सद् गृहस्थांच म्हणणं ऐकलं आणि एका महत्त्वाच्या माध्यमाची भूमिका पार पाडली होती. त्यात त्यांची अंधश्रद्धा मुळीच नव्हती. होतं ते संध्यावरचं लेकी सारखं प्रेम आणि केवळ तिच्या सुखाचाच विचार. त्यात ते गुंतलेले नसले तरी कुठेतरी सतत एका अधांतरी भविष्याचा वेध मात्र ते घेत असावेत. बौद्धिक तर्काच्या रेषेपलिकडे जेव्हा काही घडतं ना तेव्हा त्यावर वाद आणि चर्चा करण्यापेक्षा त्या घटनांकडे तटस्थपणे पहावे नाही तर त्या जशाच्या तशा स्वीकाराव्यात हेच योग्य. फार तर “आयुष्यात आलेला असा एक अतिंद्रिय अनुभव “या सदरात समाविष्ट करावे.

संध्याचे लग्न झाले. बंगालच्या भूमीत एक महाराष्ट्रीयन संसार आनंदाने बहरू लागला. दिवस, महिने, वर्षं उलटत होती. आणि ते पनवतीचं आठवं वर्षं उगवलं. खरं म्हणजे पपांशिवाय कुणाच्याच मनात कसलीच भीती नव्हती. कारण सारेच अनभिज्ञ होते. पण आठव्या वर्षीच आमच्या परिवाराला प्रचंड दडपण देणारे ते घडलेच. बाबासाहेबांना अपघात झाला होता. संध्याचाच भाईंना फोन आला होता. तशी ती धीर गंभीर होती पण एकटी आणि घाबरलेली होती. ताबडतोब कलकत्त्याला जाण्याची तयारी झाली. प्रत्यक्ष भेटीनंतर बराच तणाव हलका णझाला. कारण

श्री. अविनाश मुळे हे केवळ योगायोगाने किंवा दैवी चमत्काराने किंवा पूर्व नियोजित अथवा पूर्व संचितामुळेच एका भयानक प्राणघातक अपघातातून सही सलामत वाचले. जणू काही त्यांचा पुनर्जन्मच झाला. आता तुम्ही काही म्हणा.

“ काळ आला होता पण वेळ आली नव्हती. ”

अथवा 

“आयुष्याची दोरी बळकट किंवा देव तारी त्याला कोण मारी.

पण यानंतरची पप्पांची प्रतिक्रिया फक्त मला आठवते. ओंजळभर प्राजक्ताची फुले त्यांनी देव्हाऱ्यातल्या कृष्णाच्या मूर्तीवर भक्तीभावाने वाहिली आणि ते म्हणाले,

 हे जगन्नाथा! कर्ताकरविता तुज नमो।

अजूनही माझ्या मनात एक प्रश्न आहे. डोंबीवलीच्या त्या होरापंडितांनी त्यावेळीचं गुपित बंधुंनाच का सांगितलं नाही आणि पपांनाच का सांगितलं? या मागचं गुपित काय असेल?

जाउदे! काही प्रश्नांची उत्तरं न मिळण्यातच आयुष्याची जडणघडण असते हेच खरं!

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी, तो आणि व्हॅलेंटाईन… ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ मी, तो आणि व्हॅलेंटाईन… ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सुप्त ज्वालामुखी अचानक जागृत होऊन त्यातून लाव्हा उसळावा, तशी अचानक त्याची आठवण आली.

तशी लहानच होते मी. सहावी-सातवीत असावे बहुधा. शाळा मुलामुलींची असली, तरी मुलं-मुलं, मुली-मुली असेच ग्रूप असायचे. मी तर अगदीच लाजाळू होते. ग्रूपबाहेरच्या मुलींशीही बोलायचे नाही मी. मग मुलांची तर बातच सोडा.

फेब्रुवारीचा मध्य असावा. अचानक तो समोर आला. आमच्या वर्गातला सर्वात हुशार मुलगा. नेहमी पहिला नंबर यायचा त्याचा. मी कितीही अभ्यास केला, तरी मी दुसरीच यायचे.

तर तो अचानक समोर आला. कोणाचं लक्ष नाहीसं बघून त्याने माझ्या हातात एक कागद दिला, ” माझ्या वडिलांची बदली झालीय. हे शहर सोडून चाललोय आम्ही. यात माझा नवीन पत्ता आहे. पत्र लिही मला. नक्की. “

त्याचे डोळे अगदी काठोकाठ भरले होते. कोणत्याही क्षणी तो रडायला लागेल, असं वाटत होतं.

कागदावर त्याच्या रेखीव अक्षरात त्याचा पत्ता होता. आणि बाजूला लाल पेनने रेखाटलेला गुलाब.

मी पटकन तो कागद दप्तरात टाकला. पुन्हा समोर बघितलं, तर तो नव्हता. तो गेला होता. नंतर दिसलाच नाही.

पण तो शाळा सोडून चाललाय, म्हटल्यावर मला आनंदच झाला. आता वार्षिक परीक्षेत आणि नंतरही माझाच पहिला नंबर येणार होता.

घरी गेल्यावर दप्तर जागेवर ठेवलं. कपडे बदलून, खाऊन मी खेळायला गेले.

नंतरही त्या कागदाचं माझ्या डोक्यातूनच गेलं.

पुढे ते चिटोरं कुठे गेलं, कोणास ठाऊक! तोही डोक्यातून निघून गेला.

तेव्हा ‘व्हॅलेंटाईन्स डे’ वगैरे संकल्पना तर सोडाच, पण तो शब्दही आम्हाला माहीत नव्हता.

पण आता त्याची आठवण झाल्यावर वाटलं, की तो माझा ‘व्हॅलेंटाईन’ असेल का? किंवा नेमकं सांगायचं झालं, तर मी त्याला त्याची व्हॅलेंटाईन वाटत होते का? कल्पना नाही.

त्या दिवशी तो गेला, तो माझ्या आयुष्यातूनच गेला. नंतर तो कधीच भेटला नाही. आता भेटला, तर मी बहुधा त्याला ओळखणारही नाही. पण मी कोणाला तरी आपली व्हॅलेंटाईन वाटले, याची मला गंमत वाटली. गंमत! हो. फक्त गंमतच.

©  सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तीन शब्दांची गोष्ट…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? मनमंजुषेतून ?

☆ “तीन शब्दांची गोष्ट…” ☆ श्री जगदीश काबरे

“I Love You” हे तीन शब्द कुणी कुणालाही सहजपणाने म्हणता येऊ नयेत इतके वाईट आहेत का?

आपण आजच्या काळात जाता येता सर्रास शिव्या ऐकतो… त्याही आपल्याला सहजच वाटतात, पण कुणी ‘I love you’ हे सहजपणाने जरी बोलून गेलं तरी येणार्‍याजाणार्‍याच्या भुवया उंचावतात. अशिक्षित आणि सुशिक्षीत सगळीच माणसे याबाबतीत सारखीच.

तुमचं एखाद्यावर/एखादीवर प्रेम आहे, एखादा/एखादी तुम्हाला आवडते… हे त्याला/तिला सांगणं कसं चुकीचं आहे; हेच लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवल जातं. आणि मग हीच मुलं मोठी झाल्यावर खर्‍या प्रेमातही… ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’, हे साधंसं वाक्यही बोलायला कचरतात… बोलू शकत नाहीत… बहुधा घाबरतातच… कारण काही काही गोष्टी शिकवतांनाही त्या चुकीच्या पद्धतीने शिकवल्या गेल्या आहेत, असं मला बर्‍याचदा वाटतं.

अगदी ‘नमस्कार’ म्हणतो ना आपण ओळखणार्‍या प्रत्येकाला तेवढ्या सहजतेने… अगदी तस्सचं ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’, हे म्हणता यायला हवं. कारण प्रेम हे फक्त स्त्री आणि पुरुष संबंधातच असतं असं नाही; तर कोणत्याही दोन माणसात (gay and lesbian too) ते होऊ शकतं. असे घडले तरच आपण प्रेमाला सरकारात्मकतेने घेऊ शकू, आणि ‘व्हॅलेंटाईन डे’ चा चुकीचा अर्थ काढणे बंद करू. मग जसे आपल्या संस्कृतीतील प्रत्येक सण साजरा करण्यासाठी आपण निमित्त शोधत असतो तसाच ‘व्हॅलेंटाईन डे’ हा सुद्धा आपल्याच संस्कृतीतील सण निमित्त म्हणून आहे असे समजता येईल. असे झाले तर प्रेम व्यक्त करायला एका दिवसाची गरज काय, असा उथळ प्रश्न विचारणे बंद होईल.

म्हणून मला वाटतं I love you म्हणणं हे इतकं सहजपणाने असायला हवं की, आपल्याला आवडणार्‍या कुणाही माणसाला ते न घाबरता म्हणता यायला हवं… जितक्या सहजपणे आपण आपला अहम दुखावल्यावर द्वेष करू लागतो. पण आजची परिस्थिती पाहता भारतात द्वेष करणे सोपे आणि प्रेम करणे तेवढेच कठीण! कारण प्रेमासाठी लागते मोकळे मन! ते किती लोकांकडे आहे?

©  श्री जगदीश काबरे 

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “प्रयागराज येथील महाकुंभ.. एक अनुभव…” – लेखिका : सुश्री रविबाला काकतकर   ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे  ☆

डाॅ.भारती माटे

??

☆ “प्रयागराज येथील महाकुंभ.. एक अनुभव…” – लेखिका : सुश्री रविबाला काकतकर   ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

आत्ता नुकतेच महाकुंभला जाता आले. तीन रात्री आणि चार दिवस असे वास्तव्य होते. उत्तर प्रदेश सरकारच्या ‘आगमन’ ह्या टेन्ट सिटी मध्ये बुकिंग केले होते.

दुर्दैवानी माझी मैत्रीण आणि मी असे जाणार होतो. पण ऐनवेळी काही कारणांनी तिचे येणे cancel झाले. त्यामुळे एकटीने जाण्याचे धैर्य केले.

माझ्या जावयानी बुकिंग केले, त्या एजन्टनी दिलासा दिलान की “खूप सुरक्षित आहे तुम्ही जा. मी गाईडची व्यवस्थाही केली आहे. “

पुणे दिल्ली प्रयागराज असा विमान प्रवास करून तारीख 15 जानेवारीच्या रात्री टेन्ट सिटी ला पोहोचले. Reception मध्ये गळ्यात एक सिल्कीश स्कार्फ घालून स्वागत झाले. अतिशय उत्कृष्ट असा डिलिक्स टेन्ट आणि त्यालाच लागून असलेले स्वतंत्र न्हाणीघर अशी व्यवस्था

होती. मुख्य आखाडे, नदी, त्रिवेणी संगम सर्वांपासून हे हॉटेल किमान दोन किलोमीटर इतक्या दूर वर आहे. हॉटेलचा एकूणच परिसर खूप मोठा होता. त्यामुळे सर्वदूर जायला गोल्फ कार्ट्स होत्या. जेवणघर, स्वागतकक्ष आणि शेकडो टेन्ट्स.

बरेच परदेशी लोकही होते. मोठमोठ्या गाड्या भरून पाहुणे येतच होते.

मुख्य प्रश्न होता दुसरी कोणतीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसताना मी दुसऱ्या दिवशी गावात कशी जाणार? कारण गाडीचे भाडे दर दिवसाला 7. 8 हजार, गाईडचे भाडे 6 हजार एका दिवसाला. मी तीन रात्री चार दिवसांचे बुकिंग केले होते. मग गाईड असला तरी जाणे परवडणारेच नव्हते.

गाईडशी दुसऱ्या दिवशी सकाळी बोलल्यावर कळले ते वेगळेच. विद्यार्थ्यांची एक टीम यात्रेकारुंना सर्व दाखविण्यासाठी प्रशिक्षित केली आहे. पण त्याच्या पैकी कोणाला टेन्ट सिटी च्या आत प्रवेश नव्हता.. त्यामुळे बाहेर उभे राहून त्यातले तीनजण माझ्याशी बोलत होते. हॉटेलच्या स्टाफ पैकी एका मुलीने माझे गाईडसाठी पुण्याहून येण्यापूर्वी पैसे घेतले होतेन. तिनी आश्वस्त केल्यावर त्यांनी एक सुझाव मांडला की मी एकटी आहे आणि जर मला चालणार असेल तर ह्या मुलाच्या मोटर सायकलवर मागे बसून तो मला हा सर्व परिसर, देवळे, संगम इत्यादी दाखवेल. मी तयार झाले. कारण दुसरा काही पर्याय नव्हता. पण ह्या मुलानी तिनही दिवस माझी खूप काळजी घेतलीन. मला सर्व वेळ माझे वय पाहून मला दादीदादी म्हणत फिरवून आणले! 😄

ह्याच हॉटेलच्या मागे गंगेचा एक प्रवाह येत होता. तिथे ह्या टेन्ट सिटी च्या लोकांसाठी स्नानाची व्यवस्था होती.

सकाळपासून आणि रात्री तर खूपच थंडी होती.

त्यामुळे पाण्यात जाण्याचे धाडस होत नव्हते.

आंघोळीला पाणी नळाला गंगेचेच येत होते मग वेगळे थंडीत जाऊन पाण्यात स्नान करण्याचे धाडस होतं नव्हते. 😄 पण अखेर शेवटच्या दिवशी गार आणि स्वच्छ पाण्यात नाक दाबून डुबी घेतल्या तेव्हा जाणवले की, हा अनुभव आधीच हे का घेतला नाही 🙆‍♂️ इतके छान वाटत होते.

कुंभ मधील शाही स्नानाचे दिवस सोडले तर गर्दी खूपच कमी होती सर्वच रस्त्यांवर. आणि 

तिथल्या हॉटेल्सचे रेट्स अश्यावेळी निम्मे होतात.

पहिल्या दिवशी गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती ह्याच्या संगमाला भेट दिली.

वेणी माधव हे प्रसिध्द विष्णू – लक्ष्मी मंदिर, वासुकी नागाचे मंदीर ह्यांना भेट दिली.

झोपलेल्या हनुमानाच्या मंदिराला काही वर्षांपूर्वी भेट दिली असल्यामुळे गर्दीत गेले नाही.

त्या आधी विविध आखाड्यांना भेट दिली. जुना आखाडा येथे नागा साधू. एकानी डोक्यावर काही किलोंचे ओझे रात्रंदिवस बाळगणारा साधू, तर एकानी, त्याचा दावा हात, सतत आकाशात उंच ठेवण्याचे

आव्हान पेललेले दिसले.

तो फक्त फळांहारावर जगतो आहे.

पुढे त्यांना नेमून दिलेल्या जागांवर धुनी इतवून येणाऱ्या भक्तांना प्रसादाची राख कपाळाला लावत होते.

त्यानंतर किन्नरांच्या आखाड्याला भेट दिली.

अनेक साधू त्यांच्यापुढे ताट ठेवून त्याच्यामध्ये येणाऱ्या भक्तांना पैसे टाकण्याची विनंती करत होते. हे सर्व खूप कमर्शिअल वाटलं तरी सुद्धा त्या साधूंच्या पोटापाण्याच्या व्यवस्थे करता लोकांना आशीर्वाद देणे हा त्यांचा व्यवसाय असावा असेही वाटले.

स्वामी अवधेशानंद यांच्या आश्रमाला भेट दिली हा एक अगदी फाईव्ह स्टार मोठा आखाडा आहे. पुण्याची माझी एक मैत्रीण तिथे सेवा देत आहे.

म्हणून तिथे भेट दिली.

स्वामीजींचे दर्शन मिळाले. त्यांची राम कथा एक तास ऐकली. या स्वामीजींना भेटायला अनेक मोठी मान्यवर लोक येतात असे समजले.

माजी राष्ट्रपती रामनाथ कोवीद यायचे होते असेही समजले.

चौथ्या दिवशी आचार्य रामभद्राचार्य जे स्वतः दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत अनेक भाषांचे तज्ञ स्वतःचे विद्यापीठ असलेले आणि संत तुलसीदास यांचे रामायण मुखोद्गत असलेले गीता तसेच अनेक संस्कृत वेद मुखदगत असलेले अशी त्यांची ख्याती असल्यामुळे मला त्यांना भेटण्याची उत्सुकता होती तिथे गेल्यानंतर किमान दोन तास वाट पाहावी लागली प्रचंड गर्दीतून वाट काढत त्यांची अखेर दर्शन झाले.

वासुकी मंदिर बद्दल एक कथा कळली 

जेव्हा देव आणि दानव यांचे युद्ध झाले आणि समुद्रमंथनावेळी ज्या गोष्टी बाहेर पडल्या त्यातील जो अमृत कलश बाहेर पडला. त्याचे चार थेंब चार ठिकाणी जिथे पडले तिथे आता कुंभ आयोजित केला जातो हे सर्वश्रुत आहे उज्जैन हरिद्वार नाशिक आणि प्रयाग. देव आणि दानवांच्या या युद्धानंतर विविध वस्तू दोघांनाही मिळाल्यानंतर युद्ध समाप्त झाले परंतु ज्या वासुकीला ह्या मंथनासाठी घुसळण्यासाठी वापरण्यात आले होते त्याचे संपूर्ण अंग सोलवटल्यामुळे तो जखमी झाला. म्हणून त्यानी देवाकडे प्रार्थना केली की मला काय मिळाले?त्यावर देवाने त्याला असे सांगितले की गंगेकाठी तुझे मंदिर बांधले जाईल. तू येथे विश्रांती घे.

वेणी माधव मंदिर आणि नागवासुकीचे दर्शन झाल्याशिवाय ही यात्रा पूर्ण होणार नाही.

अशा या नागवासुकी मंदिराला जाण्यासाठी देखील प्रचंड रांग होती तरी सुदैवाने मला लवकर दर्शन मिळाले.

अशा रीतीने चौथ्या दिवशी माझी यात्रा समाप्त झाली.

अजून बरेच आखाडे आहेत परंतु त्या सर्व ठिकाणी जाता आले नाही. अनेक आखाड्यांमधून विविध प्रकारची भजने मोठ्या आवाजामध्ये चालू असतात जणू त्यांची स्पर्धाच आहे. परंतु तोही हा सर्व महा कुंभाचाच एक भाग होय. मोठमोठे वॉच टॉवर्स त्रिवेणीच्या काठी बांधलेले आहेत तेथे हरवलेल्या लोकांच्या वस्तू आणि हरवलेली माणसे यांच्यासाठी स्पीकर वरून घोषणा केल्या जातात. त्यातील एक घोषणा खूपच गमतीशीर वाटली. तो पोलीस स्पीकर वरून सांगत होता की, अजमेर से आई हुई एक सीता मैया अपने राम की राह देख रही है त्या सीतामय्याचं आणि रामाचं नाव घेऊन तीन वेळा तो पुकारत होता!

महाकुंभला भेट देण्याचा 

अनुभव फक्त

‘महसूस’ करना चाहिए, असाच आहे!

स्वच्छतेच्या जनजागृतीबद्दल सरकारचे मनःपूर्वक कौतुक आणि अभिनंदन. प्लास्टिक आणि कागद मुक्त रस्ते आणि नदीघाट बघून सरकारचे, सतत झाडत असलेल्या कर्मचाऱ्यांचे आणि भक्तांचेही आभार. अनेक ठिकाणी कचरापेट्या ठेवाल्याचाही परिणाम.

नदी काठी झालेली गंगा आरती आणि त्यानंतर शेकडो लोकांनी एकावेळी म्हटलेले राष्ट्रगीत निःशब्द करणारे होते! 🙏

त्यावेळी निर्माण झालेली प्रचंड सकारात्मक ऊर्जा आजही अंग रोमांचित करते आणि ह्या इतक्या उत्तम देशात आपण जन्मलो ह्याबद्दल परमेश्वरपुढे नतमस्तक होतो.

गंगेच्या पाण्याच्या जलतत्वाशी एकरूप होण्यासाठी गंगेकाठी काही काळ तरी बसणे हवे.

तेव्हा सुरु झालेल्या आतल्या प्रवासाचा आनंदमयी अनुभव हा सर्वस्वी आपला स्वतःचाच आणि प्रत्येकाचा वेगळा.

त्याचा प्रत्यय घ्यावा मात्र जरूर.

पुराणकथांमधील कथांच्या 

सत्या -सत्यतेचा ऊहापोह न करता श्रद्धा आणि भक्तीने ओताप्रोत भरलेल्या आणि मैलोनमैल डोक्यावर सामान घेऊन चालणाऱ्या भाविकांच्या सागरात आपणही बुडून जावे हे खरे.

त्याचमुळे दैनंदिन जीवनातील संकटांना आपण तो आपला भाग

समजून नवी उमेद घेऊन जगू शकतो. हे सर्व केवळ स्तिमीत करणारे आहे.

त्याचप्रमाणे दुसऱ्याला अनेक हातांनी केवळ देणाऱ्या भंडाऱ्यांमधील अन्नछत्रे तिथे येणाऱ्या हजारो भाविकांचा मोठा आधार आहेत.

तिथल्या जेवणाला खरंच वेगळी रुची होती ह्याचा अनुभव घ्यायला मिळाला.

एकूणताच उर्वरित दिवसांमध्ये एकदा तरी सर्वांनी महाकुंभला जरूर भेट द्यावी आणि त्या एका वेगळ्याच वातावरणाचा अनुभव घ्यावा 

🌹 🙏

लेखिका : सुश्री रविबाला काकतकर

पुणे.

प्रस्तुती : डॉ. भारती माटे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वान्तसुखाय निर्णय… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

??

☆ ✍️ स्वान्तसुखाय निर्णय… ☆ सुश्री अपर्णा परांजपे

१: निर्णय घ्यायचा असेल तर…

आपण एखाद्या निर्णय घेतो तेव्हा एकदा दुसऱ्या बाजूचा ही विचार व्हावा. जरी पटत नसली तरी दुसरी बाजू तरीही शांतपणे एकदा पुन्हा विवेकाने निःपक्षपातीपणे विचार करावा व मगच ठोस निर्णय घ्यावा. कारण आपण स्वतः घेतलेला एक निर्णय आपलेच जीवन बदलवत असतो.

बुध्दी व हृदय दोन्ही एकत्र करून विवेकाने, जागृतपणे, सावधानतेने सारासार विचार करूनच पक्का निश्चय करावा.

२: निर्णय आपल्या हातातच नसेल तर

प्रामाणिकपणाने, आत्मविश्वासाने परिणामांना शांतपणे सामोरे जावे.

आत्मिक समाधान यावरच अवलंबून असते.

*

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “प्रेम कसंही करता येतं…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “प्रेम कसंही करता येतं…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

” नीता तुझ्याशी जरा महत्वाचे बोलायचे आहे. माझ्याकडे येशील का?” पाटणकर आजींचा फोन.

” येईन की… हल्ली तुमचे पाय दुखतात म्हणून तुम्ही फिरायला येत नाही. त्यामुळे बरेच दिवसात आपली भेटही झालेली नाही. येते मग उद्या. तुमच्याकडे “

तेवढ्यात त्या घाईघाईने म्हणाल्या,

” पण एक कर.. सकाळी साडेसातला हे फिरायला जातात ना तेव्हाच ये.. यांच्यासमोर बोलता येणार नाही. “

” का बरं ?

“ अग अस फोनवर सांगता येणार नाही… घरी ये मग उद्या सांगते “

“बरं बरं “

असं म्हणून मी फोन ठेवला. काय झालं कळेना… आजोबांसमोर न सांगण्यासारख एवढं काय असेल?

दुसरे दिवशी गेले. आजी वाटच पहात होत्या. त्यांचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता. म्हणजे मामला जरा गंभीरच होता तर….. त्या सांगायला लागल्या…

” अगं काय आणि कसं सांगू काही कळत नाही बघ…. यांच्या माघारी असं यांच्या तक्रारी करणं प्रशस्त वाटत नाही. पण सांगते…. हल्ली यांना निरनिराळे घरचे पदार्थ खावेसे वाटत आहेत”

” अहो मग त्यात काय झालं ?”

“तसं नाही ग.. कसं सांगू ?

“म्हणजे खूप खातात का ?”

“नाही ग.. मोजकचं खातात. पण रोज नवीन फर्माईश असते. सकाळचे सकाळी… रात्री परत वेगळं करायला सांगतात. घारगे कर, डाळ फळं कर, परवा तर मोठा नारळ आणला आणि म्हणाले आज ओल्या नारळाच्या करंज्या कर. मग दोन दिवसांनी उकडीचे मोदक करायला लावले…. “

” हो का?” मलाही जरा आश्चर्यच वाटलं.

“अग विशेष म्हणजे हल्ली घरी मदत पण करत नाहीत. कधी कधी तर चादरीची घडी पण करत नाहीत.

हे ऐकून मात्र मी चाटच पडले. कारण आजोबा घरात सतत काहीतरी काम करत असायचे.

“नीता तुला एक आतलं सांगु का? मला असा संशय येतो की हे काही डॉक्टरांना दाखवण्यासारखे वाटत नाही. हे काहीतरी वेगळेच….. मनाचे दुखणे यांना झाले आहे असे मला वाटते. तुझा आनंद सायकॉलॉजिस्ट आहे तर त्याला विचारशील का?”

” हो हो चालेल चालेल… त्यालाच विचारू तुम्ही म्हणताय तसच मला पण वाटतय… बोलते मी आनंदशी “

“आणि खरंच एक मात्र सांगते बाई… कोणाला काही सांगू नकोस. “

“नाही नाही… आजी नाही कुठे बोलणार नाही. “

“अग.. तू काही कोणाला सांगणार नाहीस हे मला माहित आहे. म्हणून तर तुझ्याशी मनमोकळे बोलले ग.. यांना काय झालं असेल याची मनाला फार चिंता लागुन राहिली आहे बघ.. ” 

” घाबरू नका असेल काहीतरी उपाय”

आजींना कराव्या लागणाऱ्या कामापेक्षा आजोबांची काळजी वाटत होती. त्यांचे डोळे भरून आले होते…. अगदी रडवेला झाला होता त्यांचा स्वर…..

आजींचा निरोप घेऊन घरी आले.

नंतर विचार केला आणि ठरवलं की आधी आजोबांशी बोलावे. दुसरे दिवशी सकाळीच बागेत फिरायला गेले पण ते आलेच नव्हते.

तिसऱ्या दिवशी पण आले नाहीत. मग त्यांच्या ग्रुप मधल्या लोकांना विचारलं तर ते म्हणाले…

” आजोबा आज लवकर घरी गेले. साने डेअरीत चिकाच दूध आणायला जायचं आहे असं म्हणत होते. “

– – म्हणजे आज आजोबांना खरवस खावासा वाटत होता… म्हणजे आजी सांगत होत्या ते खरंच होतं तर…

आजींचा सकाळी फोन आला.

” अगं नीता आनंदशी बोलणं झालं का?”

“नाही हो तो जरा गडबडीतच आहे. जरा शांतपणे बोलायला हव…. म्हणून… आज उद्या बोलते”

” बरं बरं असू दे असू दे… अग यांनी काल गुळाचा खरवस करायला सांगितला. दोन मोठ्या कैऱ्या आणल्या आहेत. गोड आणि तिखट लोणचं करायला सांगितलेलं आहे. तुला बोलले ना तसं अजून चालूच आहे बघ… “

” हो का ? बोलते आनंदशी. बघू तो काय म्हणतो.. “

“हो चालेल.. जसं जमेल तसा कर फोन “त्या म्हणाल्या.

सहज विचारलं..

“आजोबा कुठे आहेत?”

” आता हे रोजच्यासारखे फिरायला गेले आहेत. ” त्या म्हणाल्या.

मग मी पटकन आजोबांना भेटायला बागेत गेले. ते होतेच तिथे.

म्हणाले ” काय म्हणतेस नीता ? कशी आहेस ?”

“आजोबा आज तुमच्याशीच बोलायला आले आहे. या बसू इथे बाकावर. “

आणि मग सरळ सरळ त्यांना आजींनी जे सांगितलं ते सांगायला लागले. तसं ठरवूनच गेले होते.

ऐकताना आजोबा गंभीर झाले. शांत आवाजात म्हणाले…

” सांगतो तुला… तिने सांगितलेलं सगळं खरं आहे. “

” खरं…. अस वागताय तुम्ही आजींशी ? आणि हे नवीन पदार्थ रोज करायला सांगताय त्याचे काय?”

मी विचारलं.

” हो…. मला वाटलच होत ती तुझ्याशी बोलेल… अग ऐक… झालंय काय तिचे हातपाय हल्ली दुखतात. तिचं फिरणं बंद झालं आहे. त्यामुळे संपर्क कमी. नुसती घरी बसून कंटाळायला लागली आहे. फोन तरी किती करणार ? कुणाला करणार? मग मी ही युक्ती केली. अॅण्ड् इट्स वर्क्स… “

“म्हणजे काय?” 

“आता रोज असं नवीन काही काही बनवायला सांगितलं की तिची भरपूर हालचाल होते. भूक लागते. डॉक्टर म्हणाले व्यायाम करू दे. पण ह्या वयात कसं जमणार तिला? आजपर्यंत तिने कधी काही व्यायाम केलाच नाही…. “

” हो तुम्ही म्हणताय ते पटलं मला. अचानक व्यायाम करणे कठीणच असते. “

” म्हणूनच…. नाहीतर मी तिच्याशी असं वागेन का कधी ? पण हे काही तिला सांगु नकोस “

असं म्हणेपर्यंत त्यांचे डोळे भरूनच आले होते.

खोलवर मुरलेले स्वाभाविक, निर्मळ, प्रगल्भ, बायकोचे अंतरंग जाणणारे निर्व्याज्य प्रेम त्यांच्या डोळ्यात मला दिसत होते. दोघेही या वयात एकमेकांची मनं सांभाळत होते. एकमेकांना समजून घेत होते.

आजोबांचा निरोप घेऊन निघाले.

 शांतपणे विचार केला. खरंतर अशावेळी मला फार विचार करावा लागत नाही. पण ही नाजूक अशी गोष्ट होती.

दूसरे दिवशी सकाळीच आजींकडे गेले. मला बघताच त्या म्हणाल्या..

“अग ये ये “

म्हटलं,

“आनंदशी बोलले “

त्यांनी अगदी उत्सुकतेने विचारले..

“मग तो काय म्हणाला ग ?काय सांगितलं आनंदनी?” 

” आधी शांतपणे बसा इथं. सगळं सांगते.. “

मग त्यांना सांगितलं…

” तो म्हणाला हे विशेष काळजी करण्यासारखं काही नाही. माणसांना या वयात जुनं फार आठवतं. अगदी पदार्थ सुद्धा आणि ते खावेसे वाटतात म्हणजे उलट आजोबा ठणठणीत आहेत. “

” खरंच असं म्हणाला आनंद ?”

 ” हो… खूप वर्ष काम केले शरीर दमलं की आता थोडा आराम करावा असं वाटतं शरीराला… करू दे त्यांना आराम. “

” हो ग.. खरचं.. घरची परिस्थिती यथातथाच होती. वडिलांची साधी नोकरी त्यात दोन बहिणी… त्यांची लग्नं… फार लहानपणापासूनच नोकरीला लागले हे. शिवाय संध्याकाळी एका ऑफिसात हिशोब लिहायला जायचे “

” आनंदनी असं सुचवलं आहे की तुम्ही कामासाठी कोणाची वाटलं तर मदत घ्या. तुम्हाला त्रास होत असेल तर काही कामं बाईकडून करून घ्या. तुम्ही स्वतः घरी न करता काही गोष्टी विकत आणा. “

आजींनी पटकन माझा हात हातात घेतला आणि म्हणाल्या..

“अग ह्यांना विशेष काही झालं नाही. हे कळलं आता मला चिंता नाही. मी करीन उठत बसत काम. त्यात काय ग आपल्याला सवयच असते… “

आजींचा चेहरा खुलला होता.

“नीता माझ फार मोठं काम केलस बघ. माझ्या जीवाला फार घोरं लागला होता ग…. “

“आता आजोबांची काही काळजी करू नका.. आणि मस्त काहीतरी त्यांच्यासाठी बनवा.. खुष होतील… “

आजी खुद्कन हसल्या..

” बैस ग… आता आधी आपल्या दोघींसाठी कॉफी करून आणते”

अस म्हणून आजी आत गेल्या…

त्यांचा चेहरा एकदम बदलला होता.

खरं सांगू ?….

असा निरपेक्ष निर्मळ आनंद कुणाच्या चेहऱ्यावर बघायला मिळाला की मला फार फार समाधान होते.

आता या वयात जगायला यासारखं दुसरं काही नको….

आजींना म्हटलं होतं कोणाला सांगणार नाही पण मुद्दाम हा लेख लिहिला… आपणही शिकू आजी आजोबांकडुन…. प्रेम कसंही करता येतं ते……

हो की नाही…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – २८ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

 

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – २८ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

 ताई आणि संध्या

ताई आणि संध्याचं लहानपणापासूनच अगदी मेतकूट होतं. त्या समान वयाच्या म्हणूनही असेल कदाचित. बहिणी पण आणि जिवाभावाच्या मैत्रिणी पण असं संमिश्र नातं होतं त्यांचं. म्हणजे ते तसंच अजूनही आहे वयाची ऐंशी उलटून गेली तरीही.

ताई म्हणजे माझी सख्खी मोठी बहीण आणि संध्या आमची मावस बहीण पण ती जणू काही आमची सहावी बहीणच आहे इतकी आमची नाती प्रेमाची आहेत.

अकरावी झाल्यानंतर ताई भाईंकडे म्हणजे आजोबांकडे (आईचे वडील) राहायला गेली. संध्या तर जन्मापासूनच भाईंकडे राहत होती. तेव्हा मम्मी (आजी) होती आणि भाईंची बहीण जिला आम्ही आत्या म्हणत असू तीही त्यांच्या समवेत राहायची. आत्या हे एक वैशिष्ट्यपूर्ण असं व्यक्तिमत्त्व होतं जिच्या विषयी मी नंतर लिहिणार आहेच.

संध्या या तिघांसमवेत अत्यंत लाडाकोडात वाढत होती यात शंकाच नाही पण माझ्या मनात मात्र आजही तो प्रश्न आहेच की मावशी बंधूंचं (म्हणजेच संध्याचे आई-वडील..) संध्या हे पहिलं कन्यारत्न. पहिलं मूल म्हणजे आयुष्यात किती महत्त्वाचं असतं! याचा अर्थ नंतरची मुलं नसतात असं नव्हे पण कुठेही कधीही पहिल्याचं महत्व वेगळंच असतं की नाही? मग संध्याला आजी आजोबांकडे जन्मापासून ठेवण्यामागचं नक्की कारण काय असेल? कदाचित आजीचाच आग्रह असेल का? आजी ही आजोबांची तिसरी पत्नी होती. अतिशय प्रेमळ आणि नात्यांत गुंतणारी होती. तिने आई -मावशींना कधीही सापत्न भाव दाखवलाच नाही पण तरीही तिला स्वत:चं मातृत्व म्हणजे काय हे अनुभवता आलं नाही आणि लहान मुलांची तिला अतिशय आवड होती म्हणून असेल कदाचित.. तिने जन्मापासूनच संध्याला आजी या नात्याने मांडीवर घेतले आणि तिच्यावर आजी आणि आई बनून मायेचा वर्षाव केला. अर्थात हा माझा तर्क आहे प्रत्यक्ष परिस्थितीचे आकलन मला आजपर्यंत झालेलं नाही आणि या घटनेमागची मावशीची भूमिका ही मला कळलेली नाही.

हे लिहीत असताना मला एक सहज आठवलं तेही सांगते. आम्हा तीन बहिणींच्या नंतर जेव्हा उषा निशा या जुळ्या बहिणींचा जन्म झाला तेव्हा दोन पैकी एकीला आजोबांकडे काही वर्षं ठेवावं असा एक विचार प्रवाह चालू होता. त्याला दोन कारणे होती. एकाच वेळी दोन बाळं कशी वाढवणार आणि दुसरं म्हणजे आमचं घर लहान होतं, फारसं सोयीचं नव्हतं, आठ माणसांना सामावून घेण्याची एक कसरतच होती पण त्याचवेळी हाही एक अनुभव आला की रक्ताची नाती ही एक शक्ती असते. अरुंद भिंतींनाही रुंद करून त्यात सामावून घेण्याचं एक दिव्य मानसिक बळ त्यात असतं. काही काळ आमचं कुटुंब काहीसं हादरलं असेलही पण आम्हाला बांधून ठेवणारा एक पक्का, चिवट धागा होता. जीजीने विरोध दर्शविला म्हणण्यापेक्षा जबाबदारीच्या जाणिवेनं डळमळणाऱ्या मानसिक प्रवाहाला धीर देत सांगितलं, ” कशासाठी? माझ्या नाती याच घरात मोठ्या होतील. छान वाढतील. ”

आणि त्याच आभाळमायेच्या छताखाली आम्ही साऱ्या आनंदाने वाढत होतो.

मात्र मॅट्रिक झाल्यानंतर ताई भाईंकडे कायमची राहायला गेली. त्यावेळी भाईंच्या घरात आजी नव्हती. ती देवाघरी निघून गेली होती.

संध्या आणि ताई दोघीही उच्च गुण मिळवून मॅट्रिक झाल्या. आमच्या घरात या दोघींच्या मॅट्रिकच्या यशाचा एक सोहळा साजरा झाला. आजोबांनी टोपल्या भरून पेढे गणगोतात वाटले होते.

ताईने आणि संध्याने एकत्र मुंबईच्या त्या वेळच्या नामांकित म्हणून गाजलेल्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश घेतला होता आणि ठाण्याहून ताई इतक्या लांब फोर्टस्थित कॉलेजात कशी जाणार म्हणून तिने भाईंकडेच राहावे हा प्रस्ताव बिनविरोधात मंजूर झाला होता.

ताई आणि संध्याच्या जोडगोळीत तेव्हापासून वेगळेच रंग भरले गेले. आजोबांच्या शिस्तप्रिय, पाश्चात्य जीवन पद्धतीचा संध्याला अनुभव होताच किंबहुना ती त्याच संस्कृतीत वाढली होती. आम्ही आई बरोबर भाईंकडे फक्त शाळांना सुट्टी लागली की जायचो. दिवाळीत, नवरात्रीत जायचो. पण आम्ही मुळचे धोबीगल्लीवासीयच. ईश्वरदास मॅन्शन, नाना चौक ग्रँड रोड मुंबई. इथे आम्ही तसे उपरेच होतो. सुट्टी पुरतं सर्व काही छान वाटायचं पण ताई मात्र कायमस्वरूपी या वातावरणात रुळली आणि रुजली.

आता ती ठाण्याच्या आमच्या बाळबोध घरातली पाहुणी झाली होती जणू! 

एकूण नऊ नातवंडांमध्ये संध्या आणि अरुणा म्हणजे आजोबांसाठी दोन मौल्यवान रत्नं होती. त्या तिघांचं एक निराळंच विश्व होतं. आजोबांच्या रोव्हर गाडीतून आजोबा ऑफिसात जाता जाता त्यांना कॉलेजमध्ये सोडत. अगदी रुबाबात दोघी काॅलेजात जायच्या. त्या दोघींच्या साड्या, केशरचना, केसात माळलेली फुले रोजच एकसारखी असत. एलफिन्स्टन कॉलेजच्या प्रांगणात संध्या- अरुणाची ही जोडी या एका कारणामुळे अतिशय प्रसिद्ध झाली होती. शिवाय दोघीही सुंदर, आकर्षक आणि हुशार.

दोघींच्या स्वभावात मात्र तसा खूप फरक होता. पायाभूत पहिला अधोरेखित फरक हा होता की ताई मराठी मीडीअममधली आणि संध्या सेंट कोलंबस या कान्व्हेंट स्कूल मधली. सरळ केसांची संध्या तशी शांत, मितभाषी, फारशी कोणात चटकन् मिसळणारी नव्हती. तिचं सगळंच वागणं बोलणं एका ठराविक मीटर मध्ये असायचं आणि या विरुद्ध कुरळ्या केसांची ताई! ताई म्हणजे एक तुफान, गडगडाट. कुणाशीही तिची पटकन मैत्री व्हायची. एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा तिला प्रचंड उत्साह असायचा. मला आजही आश्चर्य वाटतं की संध्याच्या पचनी ताई कशी काय पडायची? त्या दोघींची आपसातल्या या विरोधाभासातही इतकी मैत्री कशी? इतकं प्रेम कसं? 

एखाद्या बस स्टॉप वर दोघी उभ्या असल्या आणि बसला येण्यास वेळ झाला की ताईची अस्वस्थतेत अखंड बडबड चालायची. त्याचवेळी संध्या मात्र शांतपणे बसच्या लाईनीत उभी असायची. बसची प्रतीक्षा करत. कधीतरी ताईला ती म्हणायची!” थांब ना अरू! येईल नं बस. ”

पण ताईचं तरी म्हणणं असायचं, ” “आपण चालत गेलो असतो तर आतापर्यंत पोहोचलोही असतो. ”“ जा मग चालत. ” कधीतरी संध्याही बोलायची.

पण त्या दोघींचं खरोखरच एक जग होतं. आणि भाईंच्या सधन सहवासात अनेक बाजूने ते बहरत होतं हे नक्कीच. शिस्त होती, धाक होता पण वाढलेल्या गवताला मॅनिक्युरिंग केल्यानंतर जे वेगळंच सौंदर्य लाभतं तशा पद्धतीने या दोघींची जीवनं फुलत होती.

कॉलेजच्या आंतरमहाविद्यालयीन नाट्यमहोत्सवात त्या दोघी भाग घेत. संध्याची एकच प्याला मधील सिंधूची भूमिका खूप गाजली. ताईने ही प्रेमा तुझा रंग कसा मध्ये बल्लाळच्या पत्नीची भूमिका फार सुंदर वठवली होती. दोघींनाही पुरस्कार मिळाले होते. दोघींमध्ये अप्रतिम नाट्यगुण होते आणि त्यांना चांगला भावही या माध्यमातून मिळत होता.

आमच्या ज्ञातीच्या इमारतीसाठी निधी गोळा करण्याच्या निमित्ताने एक व्यावसायिक पद्धतीने नाटक बसवण्यात आलं होतं. मला नाटकाचे नाव आता आठवत नाही पण या नाटकातही ताई आणि संध्याच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या आणि या नाटकाच्या तालमी भाईंच्याच घरी होत. सुप्रसिद्ध अभिनेते रामचंद्र वर्दे यांच्या दिग्दर्शनाखाली हे नाटक बसवले जात होते. भारतीय विद्या भवनात या नाटकाचा प्रयोग झाला. शंभर टक्के तिकीट विक्री झाली होती आणि प्रयोग अतिशय सुंदर झाला होता. इतका की भविष्यात ताई आणि संध्या मराठी रंगभूमी गाजवणार असेच सर्वांना वाटले. मात्र या नाटकाच्या निमित्ताने “विलास गुर्जर” नावाचा एक उत्तम अभिनेता मात्र रंगभूमीला मिळाला होता.

ताई आणि संध्या यांचं बहरणं असं वलयांकित होतं. आमच्या परिवारात या दोघी म्हणजे नक्कीच आकर्षक केंद्रं होती. तारुण्याच्या उंबरठ्यावर त्यांचं हे असं मैत्रीपूर्ण बहिणीचं नातं सुंदरच होतं. एकमेकींची गुपितं एकमेकीत सांगणं, आवडीनिवडी जपणं, कधी स्वभाव दोषांवर बोलणं, थोडंसं रुसणं, रागावणं पण तरी एकमेकींना सतत सांभाळून घेणं समजावणं, एकत्र अभ्यास करणं मैत्रिणींच्या घोळक्यात असणं वगैरे वगैरे अशा अनेक आघाड्यांवर या दोघींचं हे नातं खरोखरच आदर्शवत आणि सुंदर होतं.

आम्ही जेव्हा सुट्टीत भाईंकडे जायचो तेव्हा मला प्रकर्षाने जाणवायचं ते म्हणजे संध्या, ताई, आजोबा आणि आत्या यांचा एक वेगळा ग्रुप होता. त्या ग्रुपमध्ये आम्ही नव्हतो. कारण बऱ्याच वेळा संध्या, ताई आणि आजोबा हे तिघंच खरेदीला जात, नाटकांना जात, आजोबांच्या ऑफिसमधल्या पार्ट्यांनाही जात. व्ही शांताराम च्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रीमियर शोचे भाईंना पास मिळत. बहुतेक हे चित्रपट ऑपेरा हाऊसला लागत आणि या प्रीमियर शोजनाही भाई फक्त ताई आणि संध्यालाच बरोबर नेत. म्हणजे तसे भाई आम्हालाही कुठे कुठे न्यायचे पण त्या नेण्यात ही “स्पेशॅलिटी” नव्हती. खास शिक्का नसायचा. ते सारं सामुदायिक असायचं, सर्वांसाठी असायचं. ”सगळीकडे सगळे” हा साम्यवाद भाईंच्या शिस्तीत नव्हता.

एकदा भाईंनी घरातच, वामन हरी पेठे यांच्या एका कुशल जवाहिर्‍याला बसवून ताई आणि संध्यासाठी अस्सल हिरे आणि माणकांची कर्णफुले विशिष्ट घडणावळीत करवून घेतली होती. कर्णभूषणाचा तो एक अलौकिक सौंदर्याचा नमुना होता. आणि एक मोठा इव्हेंटच होता आमच्या अनुभवातला. नातेवाईकांच्या लग्नसमारंभात त्या दोघी ही सुंदर कर्णफुले घालून मानाने मिरवायच्या फार सुरेख दिसायच्या दोघीही!

माझ्या मनात कुठलीच आणि कोणाशीही स्पर्धा नव्हती. जितकं प्रेम ताई वर होतं तितकंच संध्यावरही होतं. संध्या आजही आवडते आणि तेव्हाही आवडायची. कुणाही बद्दल द्वेष, मत्सर, आकस काही नव्हतं पण त्या त्या वेळी आजोबांच्या सहवासात हटकून एक उपरेपणा मात्र कुठेतरी जाणवायचा आणि तो माझा बाल अभिमान कुरतडायचा. डावललं गेल्याची भावना जाणवायची. अशावेळी मला माझी आई, आजी, पप्पा आणि धाकट्या बहिणी रहात असलेलं धोबी गल्लीतलं ते लहानसं, मायेची ऊब असलेलं, समान हक्क असलेलं घरच हवं असायचं. माझ्यासाठी ते आनंदघर होतं.

खरं म्हणजे “भाई” आजोबा म्हणूनही आणि एक स्वतंत्र व्यक्ती म्हणूनही त्यांचा प्रचंड प्रभाव माझ्या जडणघडणीवर आहेच. त्यांनी दिलेल्या आयुष्याच्या अनेक व्यावहारिक टिप्स मला जगताना कायम उपयोगी पडल्यात. मी त्यांच्याबद्दल नकारात्मक विचार करूच शकत नाही पण त्या बालवयात मी प्रचंड मानसिक गोंधळ त्यांच्या पक्षपाती वागण्यामुळे अनुभवलेला आहे हे खरं.

आजोबांकडच्या वास्तव्यात मला आणखी एक जाणवायचं की आत्याचा संध्याकडे जास्त ओढा आहे. ते स्वाभाविकही होतं. ताई ही कितीतरी नंतर त्यांच्यात आली होती. आत्याला ताई पेक्षा संध्याचं अधिक कौतुक होतं आणि कित्येकवेळा ती ते चारचौघात उघडपणे दाखवत असे. “असले उपद्व्याप अरुच करू शकते.. संध्या नाही करणार. ” यात एकप्रकारचा उपहास असायचा. पण तो फक्त मलाच जाणवत होता का? ताईच्या मनात असे विचार येतच नव्हते का? एक मात्र होतं यामुळे ताईच्या आणि संध्याच्या नात्यात कधीच दरी पडली नाही हेही विशेष. त्यावेळी मला मात्र वाटायचं.. “का आली ताई इथे? का राहते इथे? कशाचं नक्की आकर्षण तिला इथे वाटतं. ? आपल्या घरातल्या सुखाची चव हिला कळत नाही का?

 मी माझ्या मनातले प्रश्न ताईला कधीही विचारले नाहीत. मी तेव्हढी मोठी नव्हते ना! आणि हे प्रश्न कदाचित गैरसमज निर्माण करू शकले असते. त्यातील अर्थांची, भावनांची चुकीच्या पद्धतीने उकल झाली असती. पण आज जेव्हा मागे वळून मी त्या वेळच्या माझ्या मनातल्या गोंधळांना तटस्थपणे पाहण्याचा प्रयत्न करते तेव्हा एकच जाणवते.. मला माझी स्वतंत्र विचारशक्ती होती. मी कधीही कुणालाही “का?” ” कशाला?” विचारू शकत होते जर कोणी माझ्या वैयक्तिक बाबतीत ढवळाढवळ केली तर. मला माझ्यातला एक गुण म्हणा किंवा अवगुणही असू शकेल पण मी कधीही कुणाची संपूर्णपणे फॉलोअर किंवा अनुयायी नाही होऊ शकणार.. माझ्यातल्या विरोधी तत्त्वाची मला तेव्हा जाणीव होत होती आणि त्याला कदाचित माझ्या आयुष्यातल्या या दोन सुंदर व्यक्तीच कारणीभूत असतील. केवळ संदर्भ म्हणून.. ताई आणि संध्या..

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दामकृपा मंडळाचं सभासदत्व… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? मनमंजुषेतून ?

☆ दामकृपा मंडळाचं सभासदत्व… ☆  श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

दामकृपा मंडळाचं सभासदत्व – – 

२५ जानेवारीची संध्याकाळ. आधीच शनिवार-रविवार आणि त्यात पुन्हा राष्ट्रीय सुट्टी आलेली. आजूबाजूची सगळी शोरुम्स आणि मॉल्स गर्दीनं खचाखच भरून वाहत होते. कुणाला तरी भेटायला गेलो होतो आणि तिथं आम्हाला बराच वेळ लागला, म्हणून जवळच्या एका मॉलमध्ये आम्ही पोट भरण्यासाठी गेलो. पण तिथल्या कॅफेटेरियाचे दर बघून आमचे डोळेच पांढरे व्हायची वेळ आली. पंधरा-वीस स्टॉल्स होते खरे. पण किंमती अवाढव्य होत्या. ८० रुपयांची पाणीपुरी, २०० रुपयांचं सँडविच, १८० रुपयांपासून पुढे सुरू होणारी चाट हे खिशापेक्षा मनालाच परवडत नव्हतं.

मी त्यांना म्हटलं, “जाऊ द्या. आपण टपरीवर चहा घेऊ. ” 

ते म्हणाले, “जीबीएस कसा भडकला आहे, बघतोयस ना? उघड्यावरचं काही नको रे बाबा. ” आम्ही पंधरा वीस मिनिटं तिथं होतो आणि शेवटी काहीही न खाता पिता तिथून निघालो. पण त्या मॉल मध्ये जे दृश्य होतं, ते बघून मला धक्काच बसला.

तरुण मुलामुलींची तर गर्दी होतीच, शिवाय शेकड्यांनी परिवारसुद्धा होते. तिथं पाणीसुद्धा विकत घेऊन प्यावं लागत होतं. चार-पाच जणांचं बिल एक हजाराच्या वर सहजच जात असेल. कितीतरी लहान लहान मुलं त्या कॅफेटेरिया मध्ये जंक फूड मनसोक्त खात होती. कॉलेजवयीन मुलामुलींच्या जोड्या होत्या. ५०० रुपयांचं सिझलर घेऊन टेबलावर गप्पा मारत बसलेलं एक युगुल दहा मिनिटांनी ती डिश तिथंच तशीच टाकून उठून निघून गेलं. कितीतरी लोक खाणं अर्धवट टाकून उठून निघून जात होते. छोले भटुरे मागवलेल्या एका ग्रुपनं तर निम्मे भटुरे तसेच टाकले. विकत घेतलेल्या पाण्याच्या बाटल्या सुद्धा अर्धवट टाकून निघून गेलेले लोक मी बघत होतो.

बरं, असला “टाकून माजण्याचा” मस्तवालपणा करणारी जी जनता होती, ती काही मर्सिडीज क्लास नव्हती. सगळेच्या सगळे मध्यमवर्गीयच होते. “पेट्रोल २५ पैशांनी महागले अन् जनतेचे कंबरडे मोडले” किंवा “कोथिंबीर कडाडली, लोकांनी खायचं काय?” असले मथळे लिहिणाऱ्यांनी मॉलमधले हे मध्यमवर्गीय बघितलेले असतात का? असा प्रश्न मला पडला.

मेसचे डबे लावून जेवणाऱ्या मुलांचं आणि मुलींचं मी अनेकदा निरीक्षण केलंय. आठवड्यातून तीनदा तरी डब्यातलं अन्न जसंच्या तसं कचऱ्यात गेलेलं असतं. घराघरांतून गोळा केला जाणारा ओला कचरा तुम्ही अवश्य पाहा. चांगल्या प्रतीचं ब्रँडेड अन्न कचऱ्यात फेकून दिलेलं तुम्हाला दिसेल. हॉटेलमध्ये सँडविचच्या डिशमध्ये कोबी किसून डेकोरेट करून सर्व्ह करतात. तो कच्चा कोबी कितीजण खातात? मोठमोठ्या कॉफी शॉप्स मध्ये मी पाहतो, मला फार वाईट वाटतं. पाचशे-सातशे रुपये किंमतीची कॉफी अर्धवट टाकून लोक निघून जातात. पाचशे रुपयांतले तीनशे रुपये आपण कचऱ्यात ओतले, याचं त्यांना भानही नसतं आणि त्याचं त्यांना वाईटही वाटत नाही.

एकदा सोलापूरहून पुण्याला येत असताना एका प्रसिद्ध हॉटेल मध्ये आम्ही ब्रेक घेतला. शेजारच्या टेबलावर सात आठ जण बसले होते. आठ जणांनी आठ वेगवेगळ्या भाज्या मागवल्या. इतके स्टार्टर्स, इतक्या डिशेस. . टेबल अख्खं भरलं होतं. पण खाल्लं किती? जितकं मागवलं होतं त्यातलं निम्मंसुद्धा नाही. . ! बिल भरून माणसं निघूनही गेली.

याला आपण नेमकं काय नाव द्यावं? ‘महागाई किती वाढलीय’ असं ओरडणारी अगदी साधी साधी माणसंसुद्धा वडापाव घेताना पाच सात मिरच्या घेतात आणि त्यातली एखादीच खाऊन बाकीच्या चक्क कचऱ्यात टाकतात. . ! पराक्रम दाखवण्याच्या नादात एक्स्ट्रा तिखट मिसळ मागवतात आणि चार घासांतच त्यांचा धीर गळून पडतो. अन्न वाया. . ! सँडविचची हिरवी चटणी जास्तीची घेतात आणि टाकून देतात. . ! एखाद्या सँडविचवाल्याची किलोभर हिरवी चटणी दररोज सहजच उकिरड्यावर जात असेल. .

गुरुवारी – शनिवारी देवळाबाहेर हात पसरून बसलेली माणसं सुद्धा आता रुपया-दोन रुपयांचं नाणं, पार्ले बिस्कीट पुडा, एखादा वडापाव असलं काही दिलं तरी तोंड वेंगाडतात. त्यांना दहा रुपयांचं नाणं हवं असतं. ताजी पोळी-भाजी दिली तरी टाकून देणारे सुद्धा भिकारी मी पाहिलेत. मग भीक मागण्यामागची त्यांची नेमकी भावना तरी काय? आपल्याला आपल्या पात्रतेनुसार किंवा पात्रतेपेक्षा कितीतरी अधिक पटींनी मिळतंय, याची जाणीव इथेही दिसत नाही.

न कमावणारे, कमी कमावणारे, भरपूर कमावणारे, आपकमाईवाले, बापकमाईवाले सगळे सगळे या एकाच बोटीत बसलेले आहेत. काहीजणांची ही वृत्तीच आहे आणि काहीजणांना आपलं काहीतरी चुकतंय याची लांबलांबपर्यंत जाणीवच नाही. आणि दुसरं कुणी ह्यांना ही जाणीव करून द्यायला तयार नाही.

महिन्यातले पंधरा दिवस मेसचा अख्खा डबा कचऱ्यात टाकणारे विद्यार्थी आणि मुलांच्या हट्टापायी भारंभार पदार्थ मागवून त्यातलं निम्म्याहून जास्त अन्न टाकणारे सुशिक्षित पालक दोघेही समाजाचे दोषी नाहीत का ? 

महागाई वाढल्याचं ढोंग करणारी माणसं त्यांची जीवनशैली जराही बदलायला तयार नाहीत. बापकमाईवर घेतलेला ब्रँडेड कपडा जास्तीत जास्त चार पाच वेळा घालून कपाटात कोंबणारे अन् पुढच्या महिन्यात पुन्हा नवे कपडे घेणारे विद्यार्थी त्यांच्या आयुष्याचा नेमका कसा विचार करत असतील? त्यांचे आईवडील त्यांना दर महिन्याला पैसै पाठवताना काय विचार करत असतील? कॉलेजच्या ऑफिसात फी माफीचे अर्ज करून घेणारी मुलं मला जेव्हा त्यांच्या परमप्रिय मैत्रिणीसोबत फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरच्या हॉटेलमध्ये दीडशे रुपयांचा उत्तप्पा खाताना दिसतात, तेव्हां त्यांची गरिबी नेमकी कोणती? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. कारण कॉलेजची फी खोटं कारण दाखवून माफ करून घेऊन हॉटेलात एकावेळी पाचशे रुपयांची नोट खर्च करणं हे प्रामाणिक माणसाचं लक्षण नाही.

आमच्या आजूबाजूच्या परिसरात रात्री बारा वाजता पंधरा वीस बुलेट बाइक्स मोठाला आवाज करत गेल्या आणि अर्धा तास हवेत तीन चार हजार रुपयांची फटाक्यांची आतषबाजी होत राहिली की, आपण ओळखावं – आज कुठल्यातरी बेरोजगार दिवट्याचा वाढदिवस आहे आणि चार घरी धुणीभांडी करून घराचा गाडा ओढणाऱ्या आपल्या आईच्या कमाईवर फुकट मजा मारणारं पोरगं आज एक वर्षानं मोठं झालं आहे. . ! रेशनचं अन्न आणून जगणाऱ्या घरच्या पोरांचे वाढदिवस रात्री बारा वाजता भर रस्त्यावर दोन-दोन केक आणून कसे होतात? सर्वच स्तरांमध्ये माणसांच्या जगण्याच्या व्याख्या बदलतायत आणि त्या अमिबासारख्या आकार उकार बदलत चालल्या आहेत, हे स्पष्ट दिसतं. याचा विचार कुणी एकट्यानं नव्हे तर, संपूर्ण समाजव्यवस्थेनं केला पाहिजे आणि तो अत्यंत गंभीरपणे केला पाहिजे.

लोकांच्या खिशात पैसा उदंड झालाय? जास्तीचे पर्याय सहज उपलब्ध झालेत? मोकळीक अन् स्वातंत्र्य वाढलंय? की माणसाला कशाचीच किंमत राहिली नाहीय? जाणिवांचं श्राद्ध घालून कुठल्याशा पोकळ धुंदीत वागण्याची ही रीत समाजातल्या सर्वच स्तरांमध्ये जाणवण्याइतपत वाढतेय, हे प्रगतीचं अन् शहाणपणाचं लक्षण मानणाऱ्यांपैकी मी तरी नाही.

खरोखरचं सुजाण पालकत्व आणि आपण सुजाण पालक होण्यासाठी करत असलेला अनाठायी खर्च या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत का? संवेदनाशून्य सजीवांच्या फौजा निर्माण करून आपण काय मिळवतो आहोत, याचा हिशोब कधीतरी कुणीतरी लावला पाहिजे की नको? 

नादारीचा मुखवटा घालून आतून काजू-बदामांवर ताव मारणं हे माणसांच्या खोटारडेपणाचं स्वच्छ लक्षण आहे. हा दुर्गुण माणसांचं, त्यांच्या कुटुंबांचं नुकसान तर करेलच, पण पर्यायानं समाजाचंही नुकसान करेल.

हे दामकृपा मंडळ मुळात वाईट. त्याचं सभासदत्व घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. त्यामुळे, ते समाजात सगळीकडं चांगलंच जोर धरायला लागलंय.

मंडळी हो, वेळीच शहाणे व्हा आणि ह्या दामकृपा मंडळाचं सभासदत्व ताबडतोब सोडा. . . !

😯 😖😏 ☹️

© श्री मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ज्ञ,

 संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चौकट… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ चौकट… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

आज निराच्या घराची चौकट उभी करण्याचा मुहूर्त होता. नुकताच नीराने- माझ्या मैत्रिणीने एक प्लॉट घेतला होता. त्यावर घर बांधायचे ठरवले होते. आर्किटेक्ट कडून प्लॅन काढून घेऊन त्याची मान्यता आहे मिळाली होती त्यामुळे नीरा आणि तिचे पती नीरज यांनी घर बांधण्याच्या कामाला सुरुवात केली होती. पाया, चौथर्‍यापर्यंत बांधकाम आल्यावर आज प्रमुख चौकट बसवायची होती. चौकट म्हणजे घराच्या मुख्य दरवाजासाठी असलेला भक्कम आधार! त्यानंतर बाकीच्या दारांच्या, खिडक्यांच्या चौकटी बसवायचे काम सोयी सोयीने होत राहते पण मुख्य चौकट महत्वाची! त्यामुळे आम्ही दोघेही तिच्या या चौकटीच्या मुहूर्ताला आवर्जून गेलो. तिथे कॉन्ट्रॅक्टर, कामगार लोक आलेले होतेच. तसेच तिचे जवळचे नातेवाईक “गारवा”घेऊन आले होते. अजूनही लहान गावातून घरासंबंधी कामे करताना नातेवाईकांकडून म्हणजे माहेरून, नणंदे कडून किंवा इतर बहिणी यांच्याकडून गारवा आणण्याची पद्धत आहे. ‘ गारवा’ म्हणजे जेवण घेऊन येणे. खेड्यातून हे जेवण एका टोपलीतून, बुट्टीतून घेऊन येतात. त्यामध्ये पुरणपोळ्या, पुऱ्या, गावरान भाज्या, भाकरी, ठेचा, दहीभात, वेगवेगळ्या चटण्या वगैरे जेवणाचे पदार्थ घर बांधणाऱ्यांसाठी घेऊन येतात..

कदाचित घर बांधत असलेल्या माणसाला सर्वांचे करण्याची तसदी पडू नये म्हणून हे सर्व कार्यक्रमासाठी घेऊन यायची प्रथा पडली असेल! तो ‘गारवा’ शेजारीपाजारी तसेच सर्वांना वाटला जायचा आणि ‘चौकट’ उभारण्याचा सोहळा व्हायचा.

अशा या प्रथांमुळे नवीन शेजाऱ्यांची ओळख आणि माणसे जोडण्याची एक प्रक्रिया सुरू होत असे. चौकट हे घराचा मुख्य आधार त्यामुळे घर बांधायच्या पद्धतीची जी चौकट किंवा रुढी रूढ असेल त्याप्रमाणे

ही प्रथा चालू असते. अलीकडे एकत्र कुटुंबाच्या चौकटी बऱ्याच प्रमाणात निखळून पडल्या आणि विभक्त छोटी छोटी कुटुंबे आपल्याच चौकटीत राहू लागली. त्याचे काही फायदे आणि काही तोटे आपण पाहत आहोतच!

चौकट समारंभ उरकून घरी आले आणि माझ्या मनात विविध प्रकारच्या चौकटी उभ्या राहू लागल्या. मुख्य म्हणजे वागण्याची चौकट! समाजात राहताना आपण विशिष्ट चौकटीत राहत असतो. काही नीती नियम समाजाने आखलेले असतात. कोणीही उठावे आणि काहीही करावे ही सुसंस्कृत समाजाची चौकट नसते. उदा.

कारण नसताना घरात, घराबाहेर मोठमोठ्या आवाजाने बोलणे, स्पीकर लावणे, भांडणे करणे हे असभ्यपणाचे लक्षण समजले जाते. नीती नियमांची चौकट ही नेहमी लिखितच असते असे नाही, पण ती एक समाज पद्धती असते. रस्त्यातून जाताना जोरजोरात खिदळणं, मोठ्या आवाजात बोलणं, भांडणं हे चौकटी बाहेरच असतं! त्यासाठी कायद्याची चौकट असतेच, पण त्या चौकटीचा वापर अगदी आवश्यक असेल तेव्हाच केला जातो.

काही वेळा आपल्याला असे लक्षात येते की प्रत्येक कुटुंबाची एक विशिष्ट चौकट असते. काही कुटुंबात जुन्या पद्धतीचे संस्कार असतात म्हणजे कपडे वापरण्याची पद्धत, सणवार, व्रतवैकल्य करण्याची आवड, साधी राहणी, कोणत्याही प्रकारचा भपका न दाखवणारी अशी साधी माणसे असतात. अशा घरात जर एकदम मॉडर्न वागणारी सून आली तर ती बरेचदा चौकटी बाहेरची वाटते. तिचे वागणे, केसांच्या स्टाईल्स, कपडे हे सर्व जर त्या घराच्या चौकटीत नसेल तर ते इतरांच्या दृष्टीनेही वेगळे वाटते- विसंगत वाटते! म्हणून तर आपण घराला अनुरूप अशी मुलगी घरात आणण्याचा प्रयत्न करतो किंवा आपली मुलगी देतानाही दुसऱ्या घराच्या संस्कृतीचा विचार करतो.

ही चौकटीची व्याप्ती केवळ कुटुंबापुरतीच असते असे नाही तर त्या चौकटीची व्याप्ती आपण जेवढी वाढवू तेवढी वाढते! प्रथम आपल्या कुटुंबाची चौकट, तिचा आपण विचार करतो. मग समाजाची, राज्याची, राष्ट्राची आणि सर्व व्यापक जगाची! आपण जेव्हा परदेशात जातो तेव्हा हे थोडं फार लक्षात येतं.. चुकून कोणी आपल्यासारख्या राहणीचे दिसले किंवा मराठी बोलताना आढळले की लगेच हा महाराष्ट्रीयन आहे हे लक्षात येते आणि तो ‘आपला’ वाटतो. त्यावरून आठवले की, आम्ही प्रथम जेव्हा दुबईला मुलीकडे गेलो होतो, तेव्हा एका मोठ्या मॉलमध्ये फिरताना एक बाळ रडत होते आणि त्याचे आजी- आजोबा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. बाळाची आई काही खरेदीसाठी मॉलमध्ये गेली होती, त्यामुळे बाळाला रडू येत होते. त्यांच्यातील संवाद सहज कानावर पडला तो मराठीत! त्यामुळे आम्ही थबकलो. त्यांनाही आमच्याकडे बघून आम्ही भारतीय आणि मराठी माणसे आहोत हे लक्षात आले. आम्ही आपोआपच एकमेकांशी बोलायला उत्सुक झालो आणि बोललो. तेव्हा कळले की ते दोघेही महाराष्ट्रीयन असून आमच्याच भागातील होते. आपोआपच जात, भाषा, प्रांत, देश सर्व भिंतीच्या चौकटी गळून पडल्या आणि आम्ही एकमेकांशी गप्पा मारू लागलो !बाळाला खाऊ देऊन शांत केले आणि नंतर तिथून निघालो. हेच जर चौकट सोडून आपण बोललो नसतो तर तो जिव्हाळा आम्हाला लाभला नसता!

अशीच दुसऱ्या एका कुटुंबाची आमची एका बागेत भेट झाली. ते एक मुंबईचे आजी- आजोबा ह त्यांच्या नातवाबरोबर बागेत आलेले आणि आम्हीही आमच्या लेक आणि नातवाबरोबर बागेत आलो होतो. ते मराठी भाषिक आहेत हे लक्षात आल्यावर आम्ही एकमेकांशी बोललो आणि आता त्यांची आणि माझ्या मुलीच्या कुटुंबाची घट्ट मैत्री आहे!

‘मी कशाला बोलू?’ अशा विचाराने जर एकमेकांशी बोललंच नाही तर संबंध कसे जोडले जाणार? चौकटीच्या विचारा बाहेर पडले की मैत्रीची व्याप्ती अधिक वाढते हे मात्र खरे!

आपल्याकडे पूर्वीपासून जातीपातीच्या चौकटीत फार घट्ट होत्या. त्यामुळे एक प्रकारचा दुरावा कायमच असे. कोणाची जात उच्च, कोणाची खालची, यामध्ये भली मोठी दरी असे. काळाबरोबरच आता हे दुरावे थोडे कमी झाले आहेत. शिक्षणामुळे जातीची चौकट मोडली नसली तरी ढिली झाली आहे एवढे मात्र निश्चित!

परदेशात राहताना तर अशा वेगवेगळ्या चौकटी च्या नियमांनी माणूस बांधला गेलेला असतो. कायद्याचीही एक अशी चौकट असते. कायद्याच्या चौकटीनेही मनुष्य बांधला गेलेला असतो. परदेशात तर कायद्याच्या विरोधी वागले तर शिक्षा होऊ शकते..

चौकट ही अशी माणसाच्या रोजच्या जीवनाला ही व्यापून असते. काही कुटुंब चौकटीत राहतात, असं विधान करतो तेव्हा एखाद्या कुटुंबाच्या एकमेकांसोबत राहण्याच्या पद्धतीचा उल्लेख होतो. असे लोक चटकन बाहेर मिसळत नाहीत. ट्रीप ला गेले तरी ते आपल्या चौकटीतच राहतात. कोणाला सामावून घेत नाहीत आणि कुणामध्ये जात नाहीत. पु. ल. देशपांडे यांचा एक प्रसिद्ध लेख आहे त्यात त्यांनी अशा चौकोनी कुटुंबाचा उल्लेख केला आहे. नवरा, बायको, एक मुलगा, एक मुलगी असे ते चौकोनी कुटुंब! ज्यांचे वागणे आखीव – रेखीव, सुंदर, चित्रासारखे अगदी इस्त्रीचे परीट घडीचे कपडे, सौम्य वागणे, मोठ्याने न बोलणे, न हसणे, अशा अती व्यवस्थित कुटुंबातही आपला जीव गुदमरतो! अशावेळी वाटते की चौकट असावी पण ती इतकी घट्ट नसावी की, तिचा सर्वांना ताण वाटावा, सुटसुटीत, लवचिक चौकटीत माणसाने जगावे. सतत घडयाळाच्या काट्यावर राहणारी जर चौकट असेल तर त्यांना मुक्त जीवन म्हणजे काय ते कळणारच नाही!

 महाराष्ट्रीयन परंपरांचे एक चौकट असली तरी आपला पूर्ण भारत देश विविधतेत एकता अनुभवतो आपल्या देशाच्या सर्व राज्यातील लोकांमध्ये एक प्रकारची सुसूत्रता आढळते. सणवार, रिती भाती वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या असतील तरीही आपली कुटुंब पद्धती, प्रदेशानुसार खाण्यापिण्याच्या पद्धती, इतरांबरोबर सन्मानाने आचरण करण्याची पद्धती हे सर्व थोड्याफार फरकाने सगळीकडे सारखेच आहे. आत्ता बनारसच्या कुंभमेळ्याला संपूर्ण भारतभरातून लोक एका श्रद्धेने येत आहेत. गंगेत स्नान करत आहेत. देवतांची पूजा करत आहेत. तेव्हा जाणवते की ही एक मोठी संस्कृती चौकट आहे! त्या चौकटीत आपली हिंदू संस्कृती वसलेली आहे तिचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.

 निराच्या घराच्या चौकट कार्यक्रमाचा विचार करता करता माझ्या मनातील विचार खूप दूरवर गेले! माणसाच्या मूलभूत गरजा आणि आवडी या साधारणपणे समान असतात. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांबरोबरच माणसाला एकत्र समाज करून राहणे, नीती नियमांच्या चौकटीत आणि आचार विचारांच्या चौकटीत राहणे हे आवडते. आपल्या भारत देशाची चौकट माझ्या डोळ्यासमोर आली. तिचा आणखी विस्तार केला तर जगभरातील माणसांची जी विविधतेने नटलेली चौकट आहे तिचाही आपण स्वीकार केला पाहिजे. या सर्व मानव जातीच्या चौकटीचा मनाने स्वीकार केला तरच ‘हे विश्वचि माझे घर’ ही संकल्पना खऱ्या अर्थाने पूर्ण होईल….

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हुरड्याचे दिवस… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ हुरड्याचे दिवस… ☆ सुश्री शीला पतकी 

साधारणपणे डिसेंबरच्या नाताळापासून आमच्या लहानपणी शाळेला सुट्ट्या लागत त्याला नाताळाची सुट्टी नाही तर हुरड्याची सुट्टी असंच नाव असे. त्यामुळे दहा दिवसाची सुट्टी असे सुट्टी लागली रे लागली की गावाकडे जायचं. 25 किलोमीटर अंतरावर गाव, पण अक्कलकोटवरून बसमधून उतरून दुसरी बस करून जावे लागे. एसटी आमच्या शेतातच थांबत असे. गाव लहान दोन अडीच हजार संख्येचा! पाच मिनिटाच्या अंतरावर घर…   गाडीतून उतरल्यापासून गावाचे अगत्य सुरू होई..  म्हाताऱ्या बायका ‘भगवानरावन मगळू’…   म्हणून आला बला काढित. कुणी हातातलं सामान घेई आणि मग आमची वरात घरी येत असे.

घरी काका काकू अतिशय हसतमुखाने स्वागत करीत. मोठं घर वाटच पाहत असे..  आमची चुलत भावंडं आणि आम्ही दंगा करायला मोकळे. घर मोठं होतं..  समोर मोठी ओसरी, ओसरीच्या पुढे मोठे अंगण..  अंगणाच्या थोडसं पुढे गोठा..  त्यात दोन-तीन दुभती जनावरं..  गोठ्याच्या बाजूला लावलेल्या शिडीवरून माळावर जायला जिन्यासारखा भाग. अंगणात पहिल्या ओसरीवर किंचित वर तुळशी वृंदावन..  तिथेच हनुमानाच्या आणि पांडुरंगाच्या मूर्ती. बाजूला मोठी पडवी..  पडवीच्या बाजूला बंद बाथरूम. ओसरीच्या थोडसं वर पत्र्यात असलेली दुसरी ओसरी त्याच्यावर दगडाने बांधलेला मोठा भाग..  तिथे झोपाळा लावलेला असे. त्याच्या बाजूला चार खोल्या, एक मोठं देवघर, सामानाची खोली आणि दोन बेडरूम. खालच्या ओसरीला लागून भलं थोरलं स्वयंपाकघर..  ज्यामध्ये जेवणाला बसण्याची सोय..  कपाट..  त्या कपाटात दही दूध ताक ठेवण्यासाठी बांधून घेतलेले कट्टे..  तिथे बरोबर ती ती भांडी बसत असत. सरपण ठेवायला एक मोठी खोली आहे. शेगडी चूल वैल आणि त्याचा धूर बाहेर जाण्यासाठी वरच्या बाजूला धुराडे ! स्वयंपाकघर शेणानी सारवून लख्ख असे. आत उतरायला दोन मोठ्या आयताकृती पायऱ्या असत. हातपाय धुऊन स्वयंपाक घरात गेलं..  थोडं खाऊन पिऊन झालं की मग शेताकडे रवाना. त्या दिवशी नुसती शेताकडे भ्रमंती व्हायची..  किरकोळ बोर डहाळा शेंगा…   !

दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र उठल्याबरोबर तोंड धुतलं की कप घेऊन आम्ही गोठ्यात बसत असू. काका म्हशीची धार काढून आमच्या तोंडावरही ते सोडत असत. आमच्या कपात दुधाच्या धारा यायच्या की त्याचा फेस व्हायचा आणि मग तसा गच्च फेस भरलेला कप आम्ही तोंडाला लावायचा. त्या नीरशा दुधाची गोडी काही और असायची. दूध पिऊन झाले की चटणी मीठ इत्यादीचे डबे घेऊन आम्ही शेताकडे कुच करायचे. आमच्या आधी आमचा वाटेकरी निंगप्पा तिथे हजर असायचा. निंगप्पाची शिस्त भारी..  बंद गळ्याचा शर्ट धोतर..  झुबकेदार मिशा..  डोक्याला लाल मुंडासे..  कानामध्ये आता मुलं घालतात तशा बाळ्या किंवा रिंगा ! तो शेत इतकं उत्तम करायचा..  त्यांनी पाडलेल्या शेतातल्या सरी अगदी मापात असायच्या ! एकदा राजेसाहेब अक्कलकोट येथून शिकारीला आले होते..  सशाच्या. त्यांनी सरीतून बरोबर बाण सोडून मारले ती सरी इतकी सरळ होती त्याबद्दल राजेसाहेबांनी त्याला पारितोषिकही दिले होते..  असा तो पारितोषिक विजेता आमचा वाटेकरी निंगप्पा..  आम्हा मुलांना पाय झटकून पाय पुसून घोंगड्या वरती येऊ द्यायचा…   अगटी पेटवलेली असायची, तिच्या धुरावर मग आम्ही त्याने आणून टाकलेला डहाळा भाजून घेत असू. आगटीमधून बाहेर पडणारा त्या ज्वाला..  तो धूर..  त्या दुधाचा विशिष्ट वास…   एक वेगळेच वातावरण निर्माण करायचा ! धूर कमी होऊन फक्त ज्वाला शिल्लक राहायचे, हळूहळू त्या शांत व्हायच्या आणि मग अगदी फक्त आर उरायचा त्याला सर्व बाजूने राखेने लपेटून.

निंगप्पा कौशल्याने त्यात काढून आणलेली सुंदर कोवळी कणसे खोचायचा..  त्याच्याच थोडे बाजूबाजूने मोठी मोठी वांगी भाजायला टाकायचा. एरंडाची पानं धुवून पुसून तयार असायची. आम्ही अगटीच्या भोवती बसलो की मग प्रत्येकाला एक पान दिले जायचे. त्या पानावर मस्त दाण्याची चटणी, गुळाचे खडे, राजा राणी थोडासा फरसाण, किंवा चिवडा खास आमच्या काकांनी बनवलेले मीठ, त्यात जिरे हिंग वगैरे पदार्थ असायचे. या सगळ्यांच्यासह हुरड्याची पूर्वतयारी व्हायची. मग तो लीलया एकेक कणीस अंदाज घेत अगटीतून बाहेर काढायचा..  एका छकाटीने ते झटकायचा..  फुंकर मारायचा आणि हातावर चोळायचा…   कोवळे कोवळे लुसलुशीत हिरवे गार भाजलेले दाणे कणसातून बाहेर येत..  काळीशार घोंगडी वरती हिरवे कोवळे दाणे..  त्यांचं रूप देखणं दिसायचं ! मग सगळे तो गरम गरम हुरडा खाण्यासाठी तुटून पडायचे. शेजारी बसलेल्या माणसाच्या हातावर आपल्या हातातले कोवळे जाणे अलगद निंगप्पा ठेवत असे ! निंगप्पाच्या हातून आपल्या हातावर हुरडा येणे हे खूप भारी समजले जायचे…   आम्ही या शेताचे मालक आहोत याची जाणीव आम्हाला व्हायची…   काही म्हणा मालक असण्यात रुबाब असतो ! मग एकापाठोपाठ एक कणसं चोळून दाणे काढून तो आम्हाला देत असे ! मीठ लसणीची चटणी – शेंगाची चटणी – गूळ – भाजलेले शेंगदाणे, नुकतंच आगटीतनं काढलेले भाजलेले वांगे – याची चव अहाहा – कुठल्याही फाईव्ह स्टार हॉटेलमधल्या पदार्थाला नाही, न कॉन्टिनेन्टल पदार्थाला आहे..  जगातले ते सगळे ऐश्वर्य भारतीय शेतकऱ्याजवळ आहे !!!

पोटभर हुरडा खाऊन झाला की मग हुरड्याच्या धाटाखालील जाड उसाचा फडशा पडत असे. कारण आम्हाला असं सांगितलं जायचं की हुरड्यानंतर तो धाटाचा ऊस खाल्ला की हुरडा पचतो. आमची पंगत संपेस्तोवर मोठी माणसे हुरड्याला येत असत. वडील असले की दोन-तीन पाहुणे बरोबर असायचे. काकू आणि आई मात्र घरी स्वयंपाक करण्यात मग्न असायच्या. पाहुण्यांची सरबराई होई आणि मोठ्या माणसाचा हुरडा खाऊन होईपर्यंत आम्ही शेतात हुंदडायला मोकळे…   मग शेतातून हिंडताना उभ्या ज्वारीच्या धाटाखाली पाथरीची भाजी, करडीची भाजी अशा रानभाज्या..  लाल भडक टोमॅटो…   कोवळ्या काकडीच्या वेलाला लागलेल्या काकड्या…   एखाद दुसरे पिकलेले शेंदाडे..  तुरीच्या कोवळ्या शेंगा..  असा ऐवज गोळा करून आम्ही झाडाखाली ठेवलेल्या किटलीतून भरपूर ताक पिऊन घरी पळत असू ! 

घरी हे सगळं सामान टाकलं की अगदी घराच्या समोर नदी..  कपडे घेऊन नदीत डुंबायला जायचं..  तिथेच काकू आणि आई धुणं धुवत असायच्या. त्यांना कपडे वाळत घालण्यासाठी मदत करायची. नदी इतकी स्वच्छ होती की खालची वाळू स्पष्ट दिसत असे. पाण्याला फार ओढ नव्हती. बोरी नदी पण हान्नूरला तिचा आकार हरिणासारखा होत असे म्हणून त्या नदीला हरणा नदी असं म्हणत ! नदीत बराच वेळ डुंबून आणि एकमेकांच्या अंगावर पाणी उडवीत पाण्याचा मुबलक आनंद घेत आम्ही घरी परतत असू ! नदीवरून पाणी आणायचे असल्याने काकू आणि आई एक एक घागर घेऊन पुढे जात आणि आम्ही धुणे डोक्यावर घेऊन येत असू..  अर्थात कपडे वाळल्यामुळे तेव्हा ते हलकेच असायचे पण त्या दोघींना मात्र जवळजवळ अर्धा किलोमीटर पाणी घेऊन यावे लागे. बाकी पाणी भरायला गडी माणसं असत पण स्वयंपाकाचे आणि पिण्याचे पाणी मात्र घरच्या लोकांना भरावे लागे.

आमच्या आठ दिवसाच्या मुक्कामात दोन-तीन दिवस गावातल्या सरपंच पाटील इत्यादी लोकांकडून आम्हाला शिधा येत असे. त्यात हरभऱ्याची डाळ, गुळ, कणिक, भाजीपाला, आणि दूध यांचा समावेश एका मोठ्या परातीत केलेला असायचा आणि ती परात घरी यायची..  मग त्या दिवशी पुरणपोळीचा बेत केला जायचा आणि दुपारी बारा वाजता त्या घरचा माणूस येऊन ती परत घेऊन जात असे. त्यात तीन-चार पुरणाच्या पोळ्या, कटाची आमटी आणि भात भाजी त्यांच्या घरी पोहोचती केली जायची. बामणाच्या घरचा प्रसाद म्हणून ते श्रद्धेने खात असत ! 

गावातली सगळीच माणसं फार प्रेमळ होती..  मग कुणाकडे उसाचा गुऱ्हाळ असेल तर गुऱ्हाळावर निमंत्रण असायचे. इतरांच्या शेतावर हुरडा खायला निमंत्रण… 

संध्याकाळी कधीकधी काका आम्हाला नदीपलीकडच्या माळावर नेत असत. तिथे बोरीची खूप झाड होती. त्याच्याखाली एक चादर अंथरुन त्याखाली आम्ही मुले बसत असू आणि काका झाड हलवत असत आमचे बोरन्हाण व्हायचे..  अगदी खऱ्या अर्थाने….    मग ते बोराचे भले थोरले गाठोडे बांधून आम्ही घरी येत असू..  संध्याकाळी अंगणामध्ये पाटीमध्ये अगटी पेटवून काकू आणि आईसाठी स्पेशल हुरडा व्हायचा. आम्ही शेंगाचे वेल भाजून घेत असू. ओल्या हरभऱ्याचा हावळा व्हायचा म्हणजे…   वर येणाऱ्या ज्वालावर तो हरभरा भाजून घ्यायचा फार सुंदर लागायचं !आठ दिवस काका काकूंच्या प्रेमळ पाहुणचारात कसे निघून जायचे कळायचं नाही.

रात्री एका खोलीमध्ये आम्ही सगळी भावंड झोपत असू आणि मग तिथे भुतांच्या गोष्टी रंगत ! बाहेर मस्त थंडी..  पोट गच्च भरलेले..  आणि उबदार खोली..  गाढ झोप लागायची ! अस्सल मातीतले अन्न..  वाहत्या नदीचे पाणी..  शुद्ध हवा..  शेतीतला मन प्रफुल्ल करणारा आनंद ठेवा…   यांनी ते आठ दिवस कसे जायचे कळायचंच नाही. आता पाचशे रुपयांचा..  सहाशे रुपयांचा हुरडा मिळतो. पण तो आनंद पुडीत बांधून विकत घेतला तसा प्रकार आहे. हन्नूरवरून सोलापूरला येताना फार वाईट वाटायचं. येताना सामान प्रचंड वाढलेल असायचे. हरभऱ्याची भाजी, उसाच्या कांड्या, बोरं, वाळलेला हुरडा, शेंगाची चटणी, मसाले, अगदी राखुंडी सुद्धा आई बनवून घेत असे. हे सगळं भरभरून देताना काका काकूंना आनंदच व्हायचा..  साधी गरीब शेतकरी माणसं पण अतिशय प्रेमळ ! 

माझ्या शाळेतल्या शिक्षिका, कॉलेजातले प्रोफेसर, शेजार पाजार, मित्र-मैत्रिणी अशा अनेकानी आमच्या शेताचा आनंद घेतला आहे आणि त्यांना तिथे घेऊन जाण्यात आम्हालाही खूप आनंद व्हायचा. एखाद दिवसाची ती त्यांची ट्रीप त्यांच्याही आयुष्यभर लक्षात राहिलीय..  काका काकू आम्हाला स्टॅन्डपर्यंत पोचवायला यायचे. काकू आणि आईच्या डोळ्यात निघताना पाणी असायचे. आमची चुलत भावंडंही आमच्यावर तितकेच प्रेम करणारी होती. त्यामुळे हन्नूरची ओढ आजही आहे.

आता ते तितके मोठे घर, त्यात राहणारी माणसं, सारे हळूहळू वजा झाले..  शेतामधली पीकं पण संपली..  उसाचे गवत शेतात उभे राहिले..  कारण गावाला धरण झाले. सगळे गावच बदलून गेले…..     

तो गाव कुठे हरवला माहित नाही, पण मातीची ओढ मात्र कायम आहे आणि असणार…   !

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares