मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – १६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – १६  ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

 घड्याळ

आजकाल मनात निरवानिरवीचे विचार वाहतात.  वेगवेगळ्या वाटांवर,  आयुष्याच्या विविध टप्प्यांवर,  गोळा केलेल्या अनंत वस्तुंचा पसारा स्वतःच्या डोळ्यात आता खूपू  लागतो.  कित्येक वस्तू अशा असतात की ज्यांना हातही लावलेला नसतो.  केवळ हौस म्हणून गोळा केलेला हा पसारा अक्षरशः अंगावर कोसळल्यासारखा जाणवतो.  कधीतरी लागतील म्हणून जपून ठेवलेल्या वस्तूंची अडगळ जाणवू  लागते.  ‘हे सगळं आता आवरलं पाहिजे.  कुणाला तरी द्यावं नाहीतर चक्क घराबाहेर काढून टाकावे’ असे डिस्पोजेलचे विचार तीव्रतेने मनात उफाळतात.  कुठून कशी सुरुवात करावी तेही कळत नाही.  वस्तू आणताना आपण किती सहजतेने आणतो पण तीच वस्तू या घडीला कितीही निरुपयोगी असली तरी टाकून  देण्यासाठी मनाची किती जोरदार तयारी करावी लागते!

शोकेसमधल्या वरच्या फळीवर मला एक घड्याळ दिसतं. स्टीलच्या कोंदणातलं,  पांढऱ्या रंगाचं,  गोलाकार,स्पष्ट अंक आणि काटे असलेलं,  टेबलावर ठेवण्यासाठी विशाल कोनातले स्टीलचे छोटे पाय असलेलं, किल्लीचं  एक जुनं पारंपरिक घड्याळ,  अनेक वर्षांपासून बंद पडलेलं आणि तरीही संग्रही ठेवलेलं.. का? एक अँटिक पीस म्हणून का?की  कुठल्यातरी भावभावनांचा धागा अदृश्यपणे त्यात जोडला गेला असल्यामुळे का?  या भावनांच्या धाग्यांच्या गुंत्यात किती दिवस अडकायचं?  ‘एक एक वस्तू काढूनच टाकूया’  आणि सहजपणे माझा हात ते घड्याळ उचलून काढून टाकण्यासाठी उचलला जातो आणि त्याच क्षणी मी साठ बासष्ट वर्षांपूर्वीच्या एका छोट्या, अत्यंत किरकोळ घटनेच्या आठवणीत नकळतपणे गुंतून जाते. 

आठवणींची पण एक मजाच असते नाही का हो?  आठवणी सुखदुःखाच्या, फजितीच्या,  गमतीच्या,  साहसाच्या, राग लोभाच्या अशा कितीतरी आणि कुठल्याही क्षणी कुठल्याही निमित्ताने त्यांना किक मिळते.  अगदी तसेच झाले. कारण काय तर घड्याळ!

ताईचे अभ्यास करताना तिला लागणारेच आणि तिच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि अतिशय आवडते घड्याळ छुन्दाच्या हातून खळकन्  फुटले. छुंदाने ते घड्याळ का घेतले,  तिला ते हातात का घ्यावेसे वाटले आणि घेतले तर घेतले पण ते हातातून पडलेच कसे?  या प्रश्नांना त्या क्षणी ना अर्थ होता ना उत्तर होते फक्त परिणाम होता. 

ताईचे आवडते घड्याळ फुटले.

ताई संतापली.  भयंकर खवळली. फार मोठे नुकसान झाले होते तिचे जणू काही आणि आता या छुंदाचे काय करू, कशी  शिक्षा करू तिला या विचारात तिने तिच्यावर चक्क हात उगारला.  छुंदा आधीच खूप भेदरली होती,  घाबरली होती.  एका वक्तृत्व स्पर्धेत ताईला बक्षीस मिळालेलं ते घड्याळ ताईसाठी किती महत्त्वाचं होतं याची छुंदाच्या बालमनालाही नक्कीच कल्पना होती पण ताईचा हा रुद्रावतार मात्र तिला अनपेक्षित असावा.  ताईचा मार चुकवण्यासाठी ती घरातल्या घरातच पळू लागली.

आमच्या घरातल्या प्रत्येक खोलीला दरवाजा होता त्यामुळे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत असं गोल गोल पळता यायचं.  तो सीन मला आठवला की अजूनही खूप हसू येतं.  छुंदा पुढे,  ताई तिच्या मागे आणि ताईला आवरण्यासाठी जीजी ताईच्या मागे… अशा तिघी गोल गोल धावत होत्या.  त्यावेळी मी काय करत होते ते आठवत नाही पण एक दोन मिनिटात ती धावाधाव  संपली.  छुंदा रडतच होती.  ताई तिला बोल बोल बोलत होती.  जीजीने छुंदाला घट्ट पकडून मायेचं कवच  दिलेलं होतं. 

“थांब आता!  संध्याकाळी पप्पा आले की त्यांना तू केलेला प्रताप सांगतेच.  मग ते तुला शिक्षा करतील.”

 एक प्रकारे ताईने छुंदावरच्या आरोपाची याचिका हायर कोर्टात दाखल करून टाकली. 

नकळत आमच्या घरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं.  आता पप्पा घरी आल्यावर काय होणार, त्यांची  काय प्रतिक्रिया होणार?  पप्पांनाही राग नक्कीच यायचा,  ते संतप्त व्हायचेच पण त्या रागापायी त्यांनी कधी आम्हाला कठोर शिक्षा केल्याचं मुळीच आठवत नाही. थप्पड मारली  ती सदैव लाडानेच, रागाने कधीच नाही मग ताईच्या या सूट फाईलला कशाला घाबरायचं?  त्यातून छुंदा  पप्पांची सर्वात लाडकी!  या सर्वात लाडकी  या शब्दप्रयोगाची ही एक गंमत आहे बरं का?  पप्पांना आमच्यापैकी कुणीही विचारलं ना “तुमची लाडकी लेक कोण?” प्रत्येकीसाठी पप्पांच हेच उत्तर असायचं “अग! सर्वात लाडकी तूच”  पण छुंदाकडे पप्पांचा अधिक कल असावा असे मला मात्र वाटायचे. कारण ती कुणाशी कधी  भांडायची नाही,  तिची मस्ती ही शांत असायची.  शांत मस्ती  हे जरी विरोधाभासी असलं तरीही ते तिच्या बाबतीत खरं होतं.  शिवाय ती लहानपणापासूनच अत्यंत हुशार, अभ्यासू.  पप्पा तिला,” हा माझा अर्जुन” असेच म्हणायचे.  त्याला कारण बहिणींच्या रांगेत तिसऱ्या क्रमांकावर आणि गुणांच्या बेरजेत पहिल्या क्रमांकावर म्हणून असेल कदाचित.  असो.

संध्याकाळी पप्पा घरी  आले. त्यांच्या सायकलीची एक विशिष्ट धून वाजली.  पप्पा ऑफिसात जाताना ठाणे स्टेशन जवळ, त्यांच्या  मावशीच्या घरासमोर असलेल्या उसाच्या गुऱ्हाळात सायकल ठेवायचे आणि येताना ती पिकप करायचे. 

सायकलच्या घंटेने पप्पा आल्याची वर्दी दिली आणि घरात सकाळी घडलेल्या घड्याळ फुटण्याच्या घटनेचे पुन्हा तणावपूर्ण पडसाद उमटले. नेहमीप्रमाणे जीजी पप्पांच्या सायकलला टांगलेल्या सामानाच्या पिशव्या आणायला खाली उतरली.  मला वाटतं तिने त्याच वेळेला पप्पांना काही पूर्वकल्पना देऊन ठेवली असावी. जीजीचे  घराकरिता ‘आजी’व्यतिरिक्त अनेक पेशे होते. ती कधी डॉक्टर,  कधी शेफ,  कधी किरकोळ रिपेरिंगसाठी इंजिनियर,  कधी शिंपी,  कधी शिक्षक, मानसतज्ज्ञ  तर कधी वकील असे.  याप्रसंगी बहुदा तिची वकिलाची भूमिका असावी.  

पप्पा आल्याचे कळताच  छुंदा गॅलरीचा कोपरा पकडून पुन्हा रडत बसली.  ताईचा अजूनही,” थांब आता बघतेच  तुला”  हा बाणा कायम होता.

मी गॅलरीच्या उंबरठ्यावर वाकून रडणाऱ्या छुंदाला बघत होते.  सहज मनात आलं, “ अर्जुन कधी रडतो का? असा कसा हा रडका अर्जुन?”

 मी छुंदाला म्हटलं,” उठ! घे शस्त्र हातात आणि युद्धाला तयार हो!”

पप्पा घरात थोडे सेटल झाल्यावर ताईने जोरदारपणे सांगितलं,

“छुंदाने माझं घड्याळ फोडलं.  काय गरज होती तिला माझ्या वस्तूंना हात लावायची?”

संतप्त ताईला पप्पा म्हणाले,

“ काय म्हणतेस काय?  तुझं घड्याळ फुटलं? नुकसान तर झालंच. कुठे आहे छुंदा?”

 निरागसपणे छुंदा पप्पांच्या समोर अपराध्यासारखी उभी राहिली.

“ हो पप्पा पण मी मुद्दाम नाही फोडलं. चुकून हातातून पडलं आणि फुटलं. “

मग पप्पांनी स्वतः तिला मांडीवर उचलून घेतलं.

“ घड्याळ फुटलं? अरेरे!  पण आनंद आहे!  त्यात काय एवढं? आपल्याला दुसरं नवं घड्याळ मिळेल.  याहून छान, सुंदर,  पुन्हा एकदा ताई स्पर्धेत जिंकेल आणि आणखी मोठं  घड्याळ तिला बक्षीस म्हणून मिळेलच.  आहे काय नि नाही काय!”

ताईचा फुगा फुस्स झाला.

छुंदा  खुदकन हसली आणि साऱ्या घरावर आलेलं तणावाचं मळभ  दूरच झालं.  एक आभाळ क्षणात मोकळं झालं. 

आज आम्ही सगळ्याजणी वृद्धत्वाकडे झुकलोय.  पण छुंदाच्या मनातली  ताईचं  घड्याळ फोडल्याची अपराधी भावना बोथट जरी झाली असली तरी टिकून आहे आणि ताईला मात्र आपण त्यावेळी उगीचच इतके रागावलो बिचारीवर हा सल आजही बोचतो आणि मी जेव्हा या घटनेचा विचार करते तेव्हा केंद्रस्थानी मला फक्त पप्पांचेच बोल आठवतात. “आनंद आहे!  आपल्याला दुसरं नवं घड्याळ मिळेल.”

 किती साधं वाक्य पण सखोल विचारांचं! यात मुळीच बेपर्वाई नाही.  नुकसान झाल्याची कदरच नाही असेही नाही.  हे पुन्हा पुन्हा घडू नये पण आता घडलंच आहे तर त्याकडे जरा सकारात्मकतेने पाहूया.  एक गेलं तर दुसरं मिळेल. 

THIS IS NOT THE END OF LIFE.

हे तत्व किती सहजपणे पप्पानी आमच्या मनावर कोरून ठेवलं.  “नो रिग्रेट्स”  या मानसिकतेची आयुष्य जगताना जरुरी असते.  नव्हे  पुढे जाण्याचे ते शस्त्र असते हा महान विचार एका किरकोळ घटनेकडे पाहताना सहजपणे त्यांनी आमच्यावर बिंबवला.शिवाय “क्षमा वीरस्य भूषणम् हे अलगदपणै ताईला सांगितले. आणि खरोखरच ताईच्या नंतरच्या आयुष्यात ज्या अनेक दु:खद अप्रिय घटना घडल्या, ज्या लोकांनी तिचे जगणे नकोसे केले होते त्यांनाही तिने नंतर सारं काही विसरून  मोठ्या मनाने क्षमा केली. पपांचाच संस्कारना?

हेच खरे सार जीवनाचे  असे वाटते. या जीवनसत्वांनी आम्हाला इम्युनिटी दिली, एक प्रतिकारशक्ती दिली.

“थँक्स पप्पा”

आणि आताच्या या क्षणी  नकळतपणे फेकून देण्यासाठी हातात घेतलेलं ते जुनं, बंद पडलेलं घड्याळ मी पुन्हा जागच्या जागी ठेवलं.  का ? .. माहीत नाही. 

क्रमश:भाग १६. 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ते भाग्यवान… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

ते भाग्यवान… ☆ सुश्री शीला पतकी 

शाळेला सुट्टी मिळालेल्या पोरासोराने अंगणामध्ये सुंदर किल्ला बांधला. मावळे विराजमान झाले.. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर अरुढ झाले.. जागोजागी भगवे झेंडे फडकू लागले… पोर आनंदाने टाळ्या पिटू लागली.. पहाटे अंगणात केरवारे झाले.. सडा टाकला गेला. सुंदर रंगवलीत रंग भरले गेले.. पणत्यांच्या  रूपाने आकाशीची नक्षत्र अंगणात ऊतरून आली.. अंगणाचे रूप कसे दिमाखदार रंगीबेरंगी झाले. नहाणी घरात सुवासिक तेलाचा आणि उटण्याचा सुवास दरवळू लागला.. घंगाळाच्या पाण्यातन वाफा निघू होऊ लागल्या… मनसोक्त पाण्याने आंघोळीझाल्या.. साबणाच्या वासाने देहाला घमघमाट आला. देवघरामध्ये मंत्रोच्चार होऊन पूजा झाल्या अभिषेक झाले देवासाठी केलेल्या खास बेसनाच्या लाडवांचा प्रसाद त्यांना दाखवला गेला. इथे पावेतो घरातल्या सगळ्या बायका नटून थटून तयार झाल्या नव्या साड्यांची सळसळ कानी येऊ लागली बैठकीच्या हॉलमध्ये पाट रांगोळी झाली फराळाची जय्यत तयारी सुरू झाली. सारी मंडळी आरतीसाठी देवघरात जमली आरती आणि प्रसाद झाल्यावर थोडा मोठ्यांचे आशीर्वाद घेणं सुरू झालं नमस्कार आशीर्वाद झाल्यानंतर सगळी मंडळी फराळाच्या पानावर स्थानापन्न झाली लाडू चकली चिवडा शंकरपाळे कडबोळे अनारसे यांनी पान सजली पुरुष मंडळी बायकांचे कौतुक करून फराळावर ताव मारू लागली आणि बायका त्यांना आग्रह करून वाढू लागल्या… चेष्टा मस्करी हसणे खिदळणे आणि पोरट्यांचा कल्ला यात फराळ उरकला मग महिलांची पंगत.. छे छे बायकांची पंगत माज घरात रंगली.. पुरूष मंडळी गाद्यांवर सुपारी खात बैठक मारून होते. दिवाळी अंकाची पानं चाळण्यात सगळे मग्न. पोर सर्व फटाके उडवायला केव्हाच पळाली. आतून आजी आजोबांची लकेर  सावकाश उडवा रे – काळजी घ्या– भाजून घ्याल नाहीतर…. इत्यादी सूचनांचा भडीमार सुरू झाला पण लक्षात कोण घेतो ? पोरं फटाक्यात मग्न आणि बायका पुढच्या स्वयंपाकाला लागलेल्या….

असो… ! दिवाळीचे हे दृश्य फक्त आता कथा कादंबऱ्यात वाचावं. घरात इन मीन चार माणसं.. सगळं रेडीमेड.. फराळ, इडली वडा यांना डिशमध्ये स्थान आले. सगळ्यांनी मोबाईलमध्ये तोंड खूपसायचे आणि हॅप्पी दिवालीचे मेसेजेस पाठवायचे —-  

पण वरील वर्णनाची दिवाळी ज्यांनी अनुभवली ते भाग्यवान… अशा सर्व भाग्यवंतांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !!!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अशी ही एक दिवाळी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

अशी ही एक दिवाळी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

दिवाळीच्या आधीचा दिवस ! सगळीकडे फटाक्यांचे आवाज ऐकू येऊ लागले होते. वसुबारसपासूनच

आकाश कंदिल आणि दिव्यांच्या माळा वातावरण सुशोभित करत होत्या. दारासमोर रांगोळ्या दिसत होत्या. नवीन कपड्याने बाजार गजबजलेला होता. दिवाळीच्या पणत्यांनी घरे उजळून निघाली होती. घराघरातून फराळाचे वास दरवळत होते. एकंदर वातावरण दिवाळीच्या उत्साहाने भारून गेले होते आणि मी मात्र हॉस्पिटलच्या दिशेने चालले होते, आज सासूबाईंची तब्येत कशी असेल या विचारात !

आठच दिवसापूर्वी सासूबाईना अचानक पॅरॅलेसिसचा अटॅक  आला होता, तसे त्यांना ब्लडप्रेशर होतेच. माझे मिस्टर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेडिकल आॅफिसर म्हणून काम करत असल्यामुळे आम्ही त्यांना सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले होते. माझे मिस्टर तिथेच काम करत असल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल आम्हाला घरच्यासारखेच होते! तिथे नेल्याबरोबर लगेच स्पेशल रूम, ऑक्सिजन, सलाईन सर्व चालू झाले. मॉनिटरिंग नीट होत असल्यामुळे त्यांना लवकरच आराम वाटू लागला. तरीही आठ दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागल्याने आम्ही दिवाळीपर्यंत दवाखान्यातच होतो. त्या काळात अनुभवली ती  हॉस्पिटलची दिवाळी! आमच्या घरातील सर्वजण आळीपाळीने दवाखान्याच्या वेळा सांभाळत होतो. पण रात्रपाळी माझ्याकडेच होती. ज्या स्पेशल रूममध्ये ठेवले होती ती रूम वाॅर्डच्या  दाराजवळच असल्याने मला खोलीतूनच बाहेरील सर्व हालचाल दिसत असे.

खरंच, हॉस्पिटलचे वातावरण कसे असते ना! त्यातून सिव्हिल हॉस्पिटलचे! केव्हाही पेशंट्स येत- जात असत, कॅज्युअलिटी डिपार्टमेंट 24 तास चालू असे, कधी एक्सीडेंट  पेशंट तर कधी इमर्जन्सी पेशन्ट्स तर कधी डेड बॉडी अचानक येत! त्यांच्यासोबत पोलीसही आलेले असत. सतत काहीतरी घडामोडी चालू असत, पण मी होते त्यावेळी दिवाळी जवळ आल्याने जरा वेगळे वातावरण होते. हॉस्पिटलमध्ये वाॅर्ड स्वच्छ करणे, सुशोभित करणे यासंबंधी स्पर्धा लावलेल्या होत्या. त्यामुळे एरवी गॉज् तयार करणे, इंजेक्शन साठी कापसाचे बोळे तयार करून ठेवणे, ग्लोव्हज पावडर मध्ये घालून ठेवणे अशी कामे करणाऱ्या आया आता वाॅर्डच्या सुशोभीकरणाकडे वळल्या होत्या. रात्री जागून रंगीबेरंगी कागदांच्या पताकांच्या माळा तयार होत होत्या, प्रत्येक वार्डमध्ये आकाश कंदील लावले होते, वाॅर्डच्या दारात रांगोळ्या घातल्या होत्या. मेण पणत्या तेवत होत्या. आपले दुःख, आजारपण विसरून आजारी लोक आणि त्यांचे नातेवाईकही उत्साहाने यात जमेल तेवढा भाग घेत असत. मी रोज झोपायला जात असल्याने मला हे सर्व रात्री उशिरापर्यंत बघायला मिळत होते. नर्सेस आया आपली कामे उरकून दिवाळी सजावटीला हातभार लावत होत्या. आनंद कुठेही निर्माण करता येतो  आणि ती माणसाची मूलभूत प्रवृत्ती आहे हे खरं आहे!

दिवाळी घरी काय आणि इथे काय! जिथे आनंद तिथे दिवाळी! दिवाळीच्या दिवशीच सासूबाईंना डिस्चार्ज देणार होते, त्यामुळे आधीच्या रात्री मी हे सर्व पाहत होते. एरवी कोण सिव्हिल हॉस्पिटल ला जाते! सकाळी सकाळी फराळाचे खोकी तिथे आली होती. काही वाॅर्डात फळांच्या करंडयाही दिसत होत्या. लहान मुलांच्या वॉर्ड मध्ये तर बिस्कीट पुडे, फराळांची खोकी याची रेलचेल दिसत होती! आपापल्या परीने आनंदाची दिवाळी चालू होती. पहाट झाली, सनई वादनाची रेकॉर्ड लागली आणि आम्ही घरी जायच्या तयारीला लागलो. तिथे नेलेले सामान भरणे, डिस्चार्ज पेपर तयार करून घेणे, ॲम्बुलन्सची वेळ ठरवून घेणे वगैरे चालू होते. हे स्वतः ड्युटीवर असल्याने सकाळी कॅज्युअलिटी संपवून ते आमच्याबरोबर घरी येणार होते.

इकडे घरी काय चालले आहे याची कल्पना नव्हती. पण माझा भाऊ आणि वहिनी मी दवाखान्यात असल्यापासूनच घरी आलेले होते. त्यामुळे मला मुलांचे टेन्शन नव्हते. तसेच माझे दीर-जाऊबाईही तिथेच रहात होते. दिवाळीच्या सर्व फराळाचे सामान वहिनी घेऊन आली होती. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा वहिनीने दारात सडा रांगोळी केली होती. सासूबाईंची तब्येतही आता बरी होती. त्यामुळे आमच्यामध्ये एक उत्साह निर्माण झाला होता. सासुबाईंची एका खोलीत व्यवस्था लावली आणि आम्ही जरा निवांत झालो. त्या पहिल्या अटॅक नंतर चार-पाच वर्षे सासूबाई होत्या. जवळपास 30 वर्ष होत आली या गोष्टीला! पण दिवाळी आली की  हॉस्पिटलमध्ये साजरा केलेला दिवाळीचा पहिला दिवस आठवतो. एरवी आपण सिव्हिल हॉस्पिटल म्हटले की थोडे नाराजच असतो, पण तिथे राहून अनुभवलं की लक्षात येते तेथील सर्व लोक किती व्यस्त असतात. त्यांनाही सणवार सोडून  ड्युटी करावी लागत असते. सतत आजारी माणसांच्या सेवेत राहूनही आनंदाचे काही क्षण ते वेचत असतात आणि आनंद घेत असतात. या सिस्टर्स, ब्रदर्स आणि इतर स्टाफ सतत कार्यरत असतो. पेशंटची कुरकुर चालू असते, ते सर्व त्यांना संयमाने ऐकावे लागते अर्थात तिथेही काही काम चुकार लोक  असतात पण ते प्रमाण कमी असते. या आठ दिवसात हॉस्पिटलच्या वातावरणाबरोबरच तिथली दिवाळीची तयारीही मला पाहायला मिळाली !

अलीकडे आपण कोरोनाच्या काळात हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स, नर्सेस आणि सर्व स्टाफ किती काम करीत होते हे पाहिले, ऐकले. हॉस्पिटलची सेवा म्हणजे लोकसेवेचे, चिकाटीचे, काम ! संयमाने काम करीत असलेली  ही मंदिरे आहेत ! त्याबद्दल आपण कृतज्ञ राहिले पाहिजे. हे सर्व अनुभव स्वतः घेतले म्हणून त्याबद्दल आत्मीयता वाटली आणि अशी ही एक आठवणीतील दिवाळी कायमच माझ्या स्मरणात राहिली !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वाड्यातली दिवाळी… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

वाड्यातली दिवाळी… ☆ सुश्री शीला पतकी 

७६२ दक्षिण कसबा भाग, काळी मशीद, या ठिकाणी आम्ही राहत होतो एकाला एक असलेले दोन वाडे जोडून होते मालक राहत असलेल्या वाड्यातून आमच्या वाड्यात येण्यासाठी एक चोरवाट होती. एका घराच्या खोलीमध्ये ती वाट उघडत असे तिथे एक कपाट होतं अगदी हिंदी सिनेमा प्रमाणे ते कपाट पुढे सरकवलं की मालकाच्या घरात जायचं जिना असे. अशा दुहेरी वाड्याचा उपयोग रझाकार जेव्हा सोलापूरला होते तेव्हा त्या दंगलीच्या वेळी लोकांना खूप झाला त्याच्या ऐकलेल्या गोष्टी कधीतरी पुन्हा सांगेन

तर वाड्यामध्ये दिवाळी साजरी व्हायची ती आमची पहिली सत्र परीक्षा म्हणजे सहामाही परीक्षा सत्र हा शब्द अलीकडे आलाय तर ती झाली की वाड्यातली सगळी पिलावळ एकत्र जमायची. मग तिकडे सो कॉल मीटिंग लावायच्या साधारण 25 ते 30 लहान मुले आम्ही होतोच 15 वयोगटापासून ते अगदी तीन-चार वर्षापर्यंत. मग सुरुवात व्हायची वर्गणी जमा करण्यापासून साधारण दोन आणि चार आणे अशी ऐपतीप्रमाणे वर्गणी गोळा होत असे. त्यातून वाड्याचे मालक जरा जास्त द्यायचे त्या पैशातून पिवडी नावाचा एक रंग मिळत असे त्या रंगाने वाडा रंगवायचा तत्पूर्वी आधी जाळ्या काढून तो स्वच्छ झाडून घ्यायचा 12 बिराडकरूंचा तो वाडा दोन मजली सगळ्या भिंती वगैरे सगळं झाडून घ्यायचं मग वाड्यात एक पेंटर राहत होते खरंतर ते खूप महान होते बुगाजी पेंटर ते बालगंधर्वांचे पडदे रंगवण्याचे काम करीत त्यांची नातवंड तीही त्याच उद्योगात हातात प्रचंड कला त्यांच्या मार्गदर्शनाखाली काथ्याच्या ब्रशने वाडा रंगवला जायचा भंग्याकडून संडास स्वच्छ करून घेतले जायचे कारण पूर्वी वाड्याचा तोंडाशीच संडास असायचे त्यानंतर वाड्यासमोरचा नगरपालिकेचा रस्ता नगरपालिकेत जाऊन पत्र देऊन स्वच्छ केला जायचा मुरूम टाकण्याविषयी त्यांना बजावण्यात यायचे मग त्यांनी मुरूम टाकला की आम्ही ती चालून चालून जमीन धुमस करून घेत असू. त्यामुळे तिथे आम्हाला रांगोळी काढायला येत असे या बुगाची पेंटरच्या घरची मुलं रांगोळी काढण्यात वाकबगार पाडवा भाऊबीज लक्ष्मीपूजन या दिवशी आमच्याकडे वाड्यासमोर ती दृश्य साकारणारी रांगोळी असायची. हे सगळं आता अलीकडे नंतर आले भाऊबीजेची रांगोळी बघायला तर आमच्या वाड्यासमोर गर्दी व्हायची.

अशी सुंदर सगळी व्यवस्था झाली की मग घराघरातून फराळाचे वास यायचे भाजणी मसाले कुटणे इत्यादी कामे सुरू व्हायची जात्यावर दळणे उखळात कांडणे. काही गोष्टी धुवून वाळवन करणे घरात सावलीत अनारश्याच्या पिठासाठी तांदूळ पसरून एका चांगल्या पांढऱ्या शुभ्र फडक्यावर घालणे आणि मग ते उखळात गुळ घालून कुटणे असे बरेच प्रोसेस सुरू होत असत.

आम्ही मुले पणत्या करणे, त्याच्यावरती पणत्या भिजत घालणे आकाश कंदील बनवणे. . . आमच्या वाड्यात प्रभाकर आणि बंडू नावाची दोन मुले होती ती आकाशकंदील बनवत असत. ते बनवत असताना अत्यंत भक्तिभावाने आणि आदराने आम्ही त्यांच्याकडे पाहत असू. एक मोठा आकाशकंदील वाड्यात बांधला जायचा. प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे छोटे-मोठे कंदील असायचे. दारासमोर रांगोळी काढायला कोणाला दार नव्हतं. समोरची गॅलरीचे दोन फूट जागा त्यामुळे खाली काढलेली सामुदायिक रांगोळी किंवा उंबऱ्यात काढलेली छोटीशी रांगोळी एवढाच रांगोळीचा संबंध ! 

एका बाथरूममध्ये तीन बिऱ्हाडं आंघोळ करायची. त्यासाठी रात्री पाण्याची पिप भरून ठेवले जायचे. त्या तीन दिवसात मात्र अजिबात कोणी भांडत नसे, सोयी गोयीने प्रत्येकाच्या बंबातले कोणाचेही पाणी घेतले तरी चालत होते आणि सकाळी सहापूर्वी सगळ्यांच्या आंघोळी व्हायच्या. मग फटाके उडवण्याचा कार्यक्रम व्हायचा. मग फराळ…. फराळाची ताटे पहिल्याच दिवशी शेल्याने झाकून (विणलेल्या) एकमेकांच्या घरी जायचे. आता ते एवढे एवढे पाकीट मध्ये बांधून देतात तसं नव्हतं. मोठ्या ताटात सगळे पदार्थ असायचे …. चकली चिवडा करंजी अनारसे शंकरपाळ्या कडबोळी चिवड्याचे दोन-तीन प्रकार शेव. . . ताट कसे गच्च भरलेलं असायचं. वर्तमानपत्रात इतर जे कोणी सेवक असत त्यांच्यासाठी म्हणजे रामोशी, त्यानंतर वाडा साफ करणारा माणूस, कचरा उचलणारा माणूस, यांच्यासाठी पुड्या बांधल्या जायच्या. हे काम प्रत्येक घरी चालत असे. चार दिवस कुणी कुणाच्याही घरी फराळ करत असे. . . . दिवाळी संपली की मग प्रत्येकाच्या घरी फराळाचे निमंत्रण चकली चिवडा लाडू. आमच्या घरी मात्र आई सगळ्यांना उपीट करत असे … चकली चिवडा लाडवाबरोबर गरम गरम उपीट आणि मुख्य म्हणजे आमच्याकडे बसायला थोडीशी गच्ची होती, त्यामुळे तिकडे मस्त मैफिल जमत होती. वडिलांचे मित्र त्यांचा फराळ, आईच्या मैत्रिणी, आमचे मित्र मैत्रिणी, आमच्यापेक्षा तरुण मुली असलेल्या आमच्या घरातल्या बहिणी भाऊ त्यांचे मित्र मैत्रिणी, असे चार-पाच फराळाच्या पार्ट्या व्हायच्या. जेवायला रोज टोमॅटो घातलेली आमटी संध्याकाळी असायची. आमटी आणि भात हे संध्याकाळचे साधे जेवण असे.

दिवाळी अंकाची रेलचेल … मामाची लायब्ररी होती त्यामुळे दोन-तीन दिवाळी अंक सहज आमच्या हाती लागत असत. पालथे पडून दिवाळी अंक दुपारभर वाचणे हा कार्यक्रम. त्यानंतर दिवाळी संपली की मग उरलेल्या सर्व फराळांचा विचार करून बाहुला बाहुलीचे लग्न, आमच्या वाड्याचे मालक हुंडेकरी यांची एक मोठी गच्ची होती त्या गच्चीवर लावायचे. दोन गच्ची होत्या एक वरची आणि एक खालची. एकीकडे वधू पक्ष – एकीकडे वर पक्ष. आमच्या घरात एक तीन चाकी सायकल होती त्यावरून वरातीची व्यवस्था केली जायची. पताका लावल्या जायच्या. सगळे वाड्यातली मोठी माणसं सुद्धा लग्नाला झाडून हजर असायचे. लग्न झाल्यानंतर सगळे विधी मात्र व्यवस्थित केले जायचे आणि मग वरात काढली जायची. वाड्यातील ही सर्व मंडळी काडेपेटी टिकलीच्या डब्या याच्यामधून पैसा 2 पैशाचा आहेर पॅकिंगसह आम्हाला करत असत त्यामुळे आपण खरोखरच लग्न लावले असे वाटत असे. बाहुला बाहुली सजवण्याचे काम हे फार नेटाने केले जाई. मग गच्चीवरती आमच्या मालकीण बाई सर्वांसाठी पोहे उपीट चिवडा यासारखे पदार्थ करून पत्रावळीचे अर्धे अर्धे तुकडे करून सर्वांना फराळ दिला जात असे. . तेच लग्नाचे जेवण होय.

इथे पावे तो निम्मी सुट्टी संपलेली असायची. मग आमच्या वाड्यामध्ये राहणाऱ्या राणूअक्का या नावाच्या एक बाई होत्या, एकट्याच राहत असत त्या. अतिशय देखण्या होत्या. . स्मिता तळवळकरसारख्या त्या दिसायच्या. मी नेहमी त्याना म्हणायची. . ‘ यांना ना छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढला तर त्यात कामाला घ्यायला पाहिजे. ‘ इतक्या सुंदर होत्या. त्यांच्या घरी चूल असायची आणि शेगडी. आम्ही सगळी मंडळी म्हणजे लहान मुलं घरून गुळ डाळ मसाले वगैरे आणून अगदी कणीकसुद्धा त्यांच्या घरी जमा करीत असू आणि म्हणायचो की राणूअक्का तुमची पुरणाची पोळी झाली पाहिजे आणि कटाची आमटी. त्यांची कटाची आमटी खाल्ली की अर्धा तास हात झिनझिनला पाहिजे अशी मस्त तिखट असायची. मग कटाची आमटी आणि पुरणाची पोळी, बटाट्याची भाजी असा बेत. त्यांच्याकडे एक गोठा होता त्या गोठ्यात पत्रावळ्यावरती होत असे ती 40 माणसाची म्हणजे मुलांची पंगत उठायची. फार प्रेमाने करायच्या. त्या जातीने धनगर होत्या. वाड्यात कधी कुणी कुणाची जात विचारली नाही आणि कधी ती जाणवली सुद्धा नाही. माळी धनगर सोनार वाणी लिंगायत सारस्वत ब्राह्मण मराठा गुरव अशा अठरा पगड जातीने वाडा राष्ट्रीय एकात्मतेची साक्ष देत होता. वाड्याच्या मालकीणबाई साक्षात लक्ष्मी होत्या सुकन्या मोने इतक्या देखण्या होत्या. त्यांचे डोळे आणि भुवया अतिशय कोरीव, काळेभोर डोळे, छान कुरळे केस – साक्षात लक्ष्मी वावरते आहे असं वाटायचं आणि तितकीच पोटात माया. पाच रुपये भाडं सुद्धा न परवडणारी माणसं वाड्यात सुखाने नांदायचे. मालकाने कधी तगादा केला नाही. उलट एखाद्याच्या घरी कमी असेल तर मालक ते आणून देत असत. इतका माया करणारा मालक जगात कुठे नसतील. . कोणाला जागा सोडण्याचा तगादा नाही, कुणाला भाड्यासाठी किरकिर नाही, ते तरी खूप श्रीमंत होते असं नाही, पण मन मात्र खूप मोठं होतं. सगळ्या पोरी बाळी बघायचे कार्यक्रम त्यांच्याच घरी व्हायचे. सगळा वाडा त्यांना भाऊ आणि वहिनी असेच म्हणत होता, आणि ती नाती त्यांनी शेवटपर्यंत निभावली. करोडोंची स्टेटस असलेली ती मंडळी पण आजही त्यांची पुढची पिढी सुद्धा अतिशय विनम्र आहे. राणूअक्काची पुरणपोळी संपली की मग आमचे उरलेल्या फराळांची भेळ असायची. कार्यकर्ते बाईंची छोट्या मुलांची लायब्ररी असायची, कॅरम बोर्ड खेळायचा, भोवरे फोडायचे, काचा पाणी खेळायचे, नाटक बसवायचे असे सगळे करण्यामध्ये आमची सुट्टी मजेत जाई…

… अशी दिवाळी पुन्हा कधीच झाली नाही. लाईफबॉय साबणाच्या वडीच्या डब्यात मोती साबण आणि दुसऱ्या डब्यात मैसूर सॅंडल दिसला की खूप आनंद व्हायचा. हळूहळू पंधरा दिवसात त्या वड्या झिजायच्या, मग सुट्टी संपताना पुन्हा त्यामध्ये लाईफबॉय ठाण मांडून बसायचा वर्षभर. . . पण त्या लाईफ बॉय ने उर्वरित वर्षभर आमच्या शरीरावरील घाण स्वच्छ केली, तजेला दिला, आम्ही प्रसन्न झालो. त्यालाही आमच्या आयुष्यात खूप मोठे स्थान आहे.

 अशी ही सुंदर दिवाळी साडेतीन हजार स्क्वेअर फूटच्या बंगल्यात, दारासमोरच्या प्रशस्त गाडीत ढीगभर खरेदी एकावेळी करून आणावी अशी पैशाची श्रीमंती असतानाही आज आम्ही बघू शकत नाही. त्या दिवाळीची चव अंगावर जिभेवर मनामध्ये रेंगाळतेच आहे नव्या कपड्याना तो वास येत नाही. टाटाच्या तेलाच्या बाटलीचा वास भारी तेलाने नाही… नाही म्हणायला फक्त एक गोष्ट टिकून राहिली ती म्हणजे मोती साबण … मैत्रिणींनो आज मी जो हा लिहिलेला आहे तो बुद्धीने नाही.. अंतःकरणांनी लिहिलेला आहे कदाचित त्याच्यामध्ये समन्वय असेल नसेल, पण त्या सगळ्या भावना मात्र व्यक्त झाल्या. त्या आठवणी डोळ्यासमोर येऊन पुन्हा एकदा शब्दात चितारल्या गेल्यात ! 

मला वाटतं आपल्या पिढीची सर्वांची दिवाळी थोडीफार अशीच होती जिने अनेक मनं आजतागायत उजळून ठेवली आहेत. आताच्या पिढीला फुसके फटाके शोधून दुपारी सगळी घरातली मंडळी झोपली की ते उडवण्याचा कार्यक्रम माहित नाही… किंबहुना त्यांना काटकसरीने काही वापरणेच माहीत नाही… समृद्धी आली ना की सुख संपतं… हे मात्र खरे की मला वाटते सुख असले तरी समाधान नसतं… हे तर अधिक खरे नाही का?

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ खरे भिकारी… आणि आमचे दरिद्री नारायण !!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ खरे भिकारी… आणि आमचे दरिद्री नारायण !!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे

श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्ट पुणे चे ट्रस्टी आदरणीय श्री प्रताप भोसले सर, यांचा एके दिवशी मला फोन आला आणि म्हणाले, ‘तुमच्या याचक मंडळींना प्रत्येकी दहा किलो साखर; दिवाळीच्या मुहूर्तावर द्यायची आम्हाला इच्छा आहे. ‘

मी हरखून गेलो…  

तरीही भोसले सरांना मी म्हणालो, ‘सर आपण हे दान त्यांना मोफत नको देऊयात… त्यांच्याकडून काहीतरी छोटं मोठं काम करून घेऊया आणि मग त्यांना हि साखर देऊया…  

ते म्हणाले, ‘तळजाई टेकडी साफ करणे हे आमचे उद्दिष्ट आहे, आम्ही ते रोज करतो, यात तुमच्या खराटा पलटणचे लोक येतील का ? 

आणि मग आमच्या खराटा पलटण मधील वीस लोकांना आम्ही घेऊन गेलो… तळजाई टेकडी आम्हाला जमेल तशी आम्ही स्वच्छ केली…

यानंतर ट्रस्टच्या मार्फत, श्री प्रताप भोसले सर यांच्या हस्ते आम्हाला एक किलो ? दोन किलो ? नाही…. तर तब्बल 500 किलो साखर मिळाली…  

यापैकी ज्यांनी स्वच्छतेचं काम केलं होतं, अशा वृद्ध याचकांमध्ये 26 ऑक्टोबर रोजी 350 किलो साखर आम्ही श्री शंकर महाराज मठामध्येच वाटून टाकली…! 

सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या समक्ष….!!! 

यानंतर श्री प्रताप भोसले साहेब आणि त्यांच्या सेवेकर्‍यांनी आम्हाला आदराने बसवून जेवू घातले…. महाप्रसाद दिला…! 

VIP कोट्या मधून आम्हाला सन्मानाने श्रीं चे दर्शन घडवले…! 

तुम्ही भिकारी किंवा भिक्षेकरी किंवा याचक नसून माणसं आहात…. याची आम्हाला त्यांनी याप्रसंगी जाणीव करून दिली…! यावेळी माझ्या डोळ्यात पाणी होतं…! 

भिक्षेकरी वर्गाचा कुटुंब प्रमुख म्हणून मी आदरणीय सद्गुरु श्री शंकर महाराज याच्या पायाशी नतमस्तक होत आहे….! 

ज्या भोसले सर आणि त्यांच्या सेवेकर्‍यांनी आम्हा सर्वांना मानाची वागणूक देऊन, माणुसकीचे दर्शन घडवले, अशा सर्वांच्या पायावर डोकं ठेवून मी त्यांना प्रणाम करतो…!!! 

भिकारी / भिक्षेकरी म्हणजे गलिच्छ लोक… घाण आणि कचरा करतात…. असा एक समज आहे ! 

आज माझ्या या याचक मंडळींनी; माझ्या एका शब्दावर, “तथाकथित उच्च वर्गीय (??) लोकांनी” तळजाई टेकडीवर पिलेल्या दारूच्या बाटल्या उचलल्या… सोबत लेज, कुरकुरे आणि इतरही काही प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या उचलल्या आहेत…! 

मी लहान असताना, आमच्या घरात कचरा उचलायला एक मावशी आली होती… तिने घराची बेल वाजवली आणि मी आईला म्हणालो, ‘कचरा दे… कचरेवाली मावशी आली आहे…. ‘ 

माझ्या आईने घरातला कचरा देत, त्या मावशीच्या हातात काही खायच्या वस्तू ठेवल्या आणि मला म्हणाली, ‘कचरेवाली ती मावशी नाही… कचरेवाले आपण आहोत बाळा..!’ 

या शब्दांचा अर्थ तेव्हा मला कळला नाही; परंतु आता कळतो आहे…! 

पवित्र स्थानांवर दारू पिऊन बाटल्या टाकणाऱ्या श्रीमंत लोकांना मला सांगायचं आहे… “खऱ्या अर्थाने तुम्ही भिकारी आहात…!”

मी भिकारी हा शब्द वापरत नाही, भिक्षेकरी किंवा याचक हा शब्द वापरतो…

परंतु त्यांच्यासाठी भिकारी हाच शब्द योग्य आहे…!!! 

पवित्र स्थानांवर दारू पिऊन बाटल्या फेकणे, प्लास्टिकच्या पिशव्या फेकणे, प्लास्टिक बाटल्या फेकणे आणि त्या न उचलणे… …. हे सर्व करणारे लोक, कदाचित सुशिक्षित असतील, परंतु सुसंस्कारित नाहीत…! 

आणि म्हणून बुद्धी, मन, अंत:करण पैशाला विकणारे… हे लोक खरे भिकारी आहेत…!!! 

इथे या लोकांसाठी मला भिकारी हाच शब्द वापरायचा आहे…!

असो … या भिकाऱ्यांनी” केलेली घाण… माझ्या दरिद्रीनारायणाने आज साफ केली आहे…! 

या बदल्यात सद्गुरु श्री शंकर महाराज यांनी मात्र प्रत्यक्ष आम्हाला आशीर्वाद देऊन, आज खऱ्या अर्थाने आम्हा दरिद्रीनारायणांना श्रीमंत केलं आहे….!!! 

नतमस्तक !!! 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ झुलणारा आकाशकंदील ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

??

☆ झुलणारा आकाशकंदील  ☆ डॉ. जयंत गुजराती

ठिपक्या ठिपक्याने उमटणारी रांगोळी, त्यात पुरले जाणारे रंग म्हणजे दिवाळी. शिवून आलेले नवीन कपडे घालण्याची हौस म्हणजे दिवाळी. फटाक्यांची माळ तसेच उंच उंच उडणारे लखलखणारे बाण, प्रकाशपर्वास अनुरूप अशा कारंजासह फुलणाऱ्या कोठ्या, भूईचक्रांची पळापळ, टिकल्यांची फटफट, म्हणजे दिवाळी, तळणाचा खमंग वास घरभर पसरून राहणे म्हणजे दिवाळी, अन् हो रंगीबेरंगी आकाशकंदील आतील दिव्यासह झुलत राहणे म्हणजे दिवाळी.

वात्सल्यमूर्ति सवत्सधेनुचे पूजन करत माया ममतेचे आरोपण करणे म्हणजे दिवाळी. मांगल्याची कामना करत दिव्यांची आरास रचत भावविश्व समृद्ध करणे म्हणजे दिवाळी. असूरांचा संहार करत जीवन मूल्यांची पुनर्स्थापना म्हणजे दिवाळी. अनपगामिनी, परत न जाणाऱ्या लक्ष्मीचे मनोभावे आवाहन करणे म्हणजे दिवाळी. नवनवे नित्यनूतन काही गवसावे याची वांच्छा राखून नूतन वर्षाचे मुक्तमनाने स्वागत करणे म्हणजे दिवाळी. भावा बहिणीचे अक्षय टिकणारे नाते अधिक सुदृढ व सकारात्मक रहावे यासाठीची उजळणी, ओवाळणीसह साजरे करणे म्हणजे दिवाळी. अशी दिवाळी आपणा सर्वांस लाभो व हो तो रंगीबेरंगी आकाशकंदील मनात कायमचा झुलत राहो या सदिच्छांसह – – –

विनीत,

डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-६ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-६ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

.. चैत्र पालवी…

मराठी चैत्र महिना उत्साहाचं वारं घेऊनच येतो. माहेरवाशिण चैत्रगौर घरोघरी विराजमान होते. आपल्यातल्या सुप्त गुणांना, कलेला वाव देण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू होते. आमची आई आणि विमल काकू चैत्रगौर अप्रतिम सजवायच्या. पंचामृत, शुद्धोदक चंदन, अत्तर लावून चैत्रगौर लखलखीत घासलेल्या नक्षीदार झोपाळ्यात मखमली आसनावर विराजमान व्हायची. गृहिणीच्या उत्साहाला उधाण यायचं. हळदी कुंकवाच्या दिवशी. घरातल्याच वस्तू वापरून कमी खर्चात सुंदर आरास सजायची. सोनेरी जरीकाठाचे, मोतीया रंगाचे उपरणे अंथरून पायऱ्या केल्या जायच्या. अफलातून आयडिया म्हणजे सुबक कापून टरबुजाचं कमळ, कैरीचा घड, द्राक्षाचं स्वस्तिक आणि हिरव्यागार पोपटी कैरीला टोकाकडून कुंकू पाण्यात कालवून लाल जर्द चोचीचा डौलदार पोपट सुंदर ग्लासात ऐटीत बसायचा. छताला हाताने बनवलेलं तोरण चमकायचं. फळांच्या खाली बारीक दोऱ्याने विणलेली कमळं ऐसपैस पसरली जायची. असा होता चैत्रगौरीचा थाट. मग का नाही गौर प्रसन्न होणार?

आईच्या मैत्रिणीकडे शांतामावशीकडे अन्नपूर्णेसह लक्ष्मी पाणी भरत होती. चांदीच्या ताटात वाट्या, तांब्याभांडं, व पेल्याचा सेटच होता तिच्याकडे. त्याकाळी स्टील घेणे सुद्धा महागात पडायचं. सजलेल्या चैत्रगौरीपुढे चांदीच्या ताटलीत छोट्या नक्षीदार वाट्यांमधून आंब्याची डाळ, पन्हं आणि झक्कास हरभऱ्याची उसळ, काकडीची चकती सुबकपणे मांडून चविष्ट नैवेद्य देवीपुढे मांडला जायचा. चांदीच्या रेखीव पेल्यात केशर, विलायची युक्त केशरी पन्हं पाहून आमच्या मुलांच्या तोंडाला पाणी सुटायचं आणि मग काय ! पोटभर छानशी उसळ, चटकदार कैरीची डाळ, आणि बर्फाचे खडे घातलेले जम्बो ग्लासातले ते केशरी अमृत पिऊन पोटभर फराळ करून हळदी कुंकवाची, फराळाची सांगता व्हायची.

सवाष्णीसाठी तर हा समारंभ म्हणजे मानाचे पान. हळदी कुंकू, गजरा, अत्तर, आंब्याच्या डाळी, आणि काकडीबरोबर घशाला थंडावा देणारं अप्रतिम चवीचं थंडगार पन्हं पिऊन त्या तृप्त तृप्त व्हायच्या.

नवरात्रात रोज उठता बसता म्हणजे पहिल्या आणि दसऱ्याच्या दिवशी सवाष्ण व कुमारीका जेवायला असायची. पुण्यात शिकायला आलेले गरीब विद्यार्थी अध्ययन शिक्षण घ्यायचे पण पोटोबाचे काय? हा त्यांचा प्रश्न सुगरण गृहिणी सहजतेने माधुकरी देऊन सोडवायच्या. आता मुलांना तोंडातून शब्द बाहेर पडल्यावर सहज अगदी त्या क्षणी सारं काही मिळतंय, आई-वडिलांच्या जीवावर पैसा अडका, कपडे, चैनीच्या वस्तू, गाड्या अगदी विनासायास मिळताहेत, पण त्या काळी पोटासाठी पुण्यात विद्यार्थ्याला ठराविक घर हिंडून घरोघरी “भवती भिक्षां देही ” असं म्हणून फिरावे लागायचे. तेव्हां गृहिणीची त्या देण्यात.. “अतिथी देवो भव ” ही पुण्यकर्माची भावना असायची. बुद्धीने कष्टाने मिळवलेलं ते संघर्षमय असं विद्यार्थी जीवन होतं. अशा या विद्येच्या माहेरघरात कितीतरी विद्यमान व्यक्ती यशोदायी होऊन शिक्षण क्षेत्रात चमकल्या. उगीच नाही पालक म्हणायचे, ‘ पुणं तिथे काय उणं ‘. असं होतं विद्यादान, अन्नदान करण्यात अग्रगण्य असलेलं तेव्हाचं कसबे पुणं..

– क्रमशः भाग सहावा

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आणि…कविता जिवंत राहिली… भाग – 2☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? मनमंजुषेतून ?

☆ आणि…कविता जिवंत राहिली… भाग – 2 ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

(माझी तमाशा नावाची कविता बेंबीच्या देठातून सादर केली. कविता संपली. टाळ्या कानावर यायला लागल्या. त्याच टाळ्यांच्या आवाजात पुन्हा येऊन जाग्यावर बसलो आणि पुन्हा डोळ्यासमोर संसार दिसू लागला.) – इथून पुढे 

स्पर्धा संपली. पारितोषिक वितरण समारंभ सुरू झाले. त्यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार होतं. मंचावर ते उपस्थित होते. सूत्रसंचालकाने विजेत्यांची नावे जाहीर करण्यासाठी माईक हातात घेतला. आणि छातीत धडधड सुरू झाली. त्याने सर्वात आधी तृतीय क्रमांक पुकारला. टाळ्या सुरू झाल्या. तो तीन नंबरचा विजेता स्टेजवर गेला. त्याच्या हातात ट्रॉफी, गळ्यात शाल, पुष्पगुच्छ व ते पांढऱ्या रंगाचं पाकीट राजकुमार बडोले यांनी दिलं. त्याला तिथेच थांबवला. माझी नजर त्याच्या पांढऱ्या पाकिटावरून हटत नव्हती. सूत्रसंचालकाने दुसरा नंबर घोषित केला. माझं नाव नव्हतं. पोटात अजून गोळा आला. तो विजेता ही तसाच जाऊन स्टेजवर थांबला. आणि आता सुत्रसंचालक प्रथम क्रमांक घोषित करणार होता. मी डोळे गच्च मिटून घेतले. पोटात कळ यायला लागली होती. छातीत धडधड वाढेलेली होती. दोन डोळ्यांच्या बंद पापणीच्या आड फक्त गरोदर असणारी माझी पत्नी माझी वाट बघत असलेली दिसत होती. आणि कानावर आवाज आला. “आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा विजेता आहे, ज्याने तमाशा कविता सादर केली असा नितीन चंदनशिवे. “टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत होता. बंद पापणीच्या आतून डोळ्यांनी बांध सोडला आणि गालावर पाणी घळघळ वाहायला लागलं. सगळ्या जगाला मोठ्याने ओरडून सांगावं वाटत होतं मी आयुष्यभर कविता लिहिणार आहे. होय मी कवी म्हणून जिवंत राहणार आहे.

टाळ्या थांबत नव्हत्या. आतल्या आत हुंदके देत मी स्टेजवर गेलो. बाजूच्या विंगेतून साडी नेसलेली मुलगी हातात ट्रे घेऊन येताना दिसू लागली. मी प्रमुख पाहुण्यांच्या समोर अंतर राखून उभा राहिलो होतो. फोटोवाला फोटो घेण्यासाठी कॅमेऱ्या डोळ्याला लावून तयार झाला होता. मी खिशातला मोबाईल काढला. आणि दिपालीला फोन केला. पहिल्या रिंगमध्ये फोन उचलला आणि म्हणली, “चंदनशिवे काय झालं सांगा ना लवकर, “ती बिचारी वेड्यासारखं हातात फोन धरून माझ्या फोनची वाट बघत बसली होती. मी फोन कानाला दाबून गच्च धरला आणि म्हणलं, “दिपाली पहिला नंबर आलाय. ” मला एक अपेक्षा होती तिने अभिनंदन वैगेरे म्हणावं अशी. पण ती तसलं काही बोलली नाही. ती पटकन म्हणाली, ‘ते पहिला नंबर आलाय ठीक आहे पण रक्कम किती आहे ते सांगा आधी. “आणि तेवढ्यात ती मुलगी ट्रे घेऊन जवळ आली. ती प्रमुख पाहुण्यांच्या हातात ट्रे देत होती. इकडं कानाजवळ दिपाली फोनवरून रक्कम विचारत होती. माझ्या डोळ्याला समोर फक्त पांढरं पाकीट दिसू लागलं. मी कसलाच विचार केला नाही. ते पाकीट मी हिसकावून हातात घेतलं. सगळेजण तोंडाकडे बघत होते. मला काहीच वाटत नव्हतं. मी स्टेजवर ते पाकीट फोडलं. दोन बोटं आता घालून त्या पाचशे रुपयाच्या नोट्या मोजल्या. दहा नोटा होत्या. आणि मी फोन कानाला लावून म्हणलं, “दिपाली, पाच हजार रुपये आहेत. “हे वाक्य बोलताना घळकन डोळ्यातून एक धार जोरात वाहिली. त्यावर दिपाली काहीच बोलली नाही. तिचा एक बारीक हुंदका मात्र ऐकू आला. आणि जवळ जवळ वीस पंचवीस सेकंद आम्ही एकमेकांशी काही बोललो नाही. फक्त दोघांचे श्वास आम्ही अनुभवत होतो. मला वाटतं आम्ही दोघेजण किती जगू माहीत नाही. पण, आयुष्यातला तो पंचवीस सेकंदाचा काळ हा सुवर्णकाळ वाटतो मला. आम्ही नवरा बायकोने त्या पंचवीस सेकंदाच्या काळात आमचं जन्मोजन्मीचं नातं मुक्याने समजून घेतलं. नंतर हातात ती ट्रॉफी आली. गळ्यात शाल पडली. फुलांचा तो गुच्छ घेतला. आणि मी तिथून कसलाही विचार न करता निघालोसुद्धा. त्या फोटोवाल्याला हवी तशी पोझ मिळालीच नाही. आणि माझ्या त्या वागण्याने सगळेजण मला बावळट आहे की काय अशा नजरेने बघत होते. फोटोवाला ही रागानेच बघत होता. मी थेट गेटमधून पांढरं पाकीट खिशात कोंबून बाहेर पडलो.

घरी येताना तिच्यासाठी मिठाई घेतली. तिला समोसे आवडतात. म्हणून गरमागरम समोसे ही घेतले. तिसऱ्या मजल्यावर आमचं घर होतं. मी अक्षरशा पायऱ्या तुडवत पळत पळत धापा टाकत दारात आलो. दार वाजवणार तेवढ्यात तिनेच दार उघडलं. आणि म्हणाली, “कवी नितीन चंदनशिवे यांचं माझ्या संसारात स्वागत आहे. ” हुंदका दाटून आला. मला स्पर्धा जिंकल्याचा, पाच हजार मिळाल्याचा, आनंद नव्हताच. मी आयुष्यभर तिच्यासमोर ताठ मानेने कविता लिहिणार होतो कवी म्हणून तिच्या नजरेत जगणार होतो. कवी म्हणून जिवंत राहणार होतो. याचा आनंदच नाही तर मी हा महोत्सव माझ्या काळजाच्या गाभाऱ्यात आतल्या आत साजरा करत होतो. तिने माझे पाणावलेले डोळे पुसले. तिच्यासाठी खायला आणलेलं तिच्या हातात दिलं. आम्ही दोघेही खायला बसलो. आणि ती म्हणाली, “चंदनशिवे आपल्याला जर मुलगा झाला तर आपण त्याचं नाव निर्भय ठेवायचं. कारण आज पोटात तो सारखं लाथा मारून मला त्रास देत होता. तो सोबतीला होता म्हणून मनात भितीच नव्हती. तुमचा फोन येणार आणि तुम्हीच जिंकलाय असं सांगणार असंच वाटत होतं. “

सगळी मिठाई दोघांनी खाल्ली. तिने कागद आणि पेन घेतलं. आणि किराणा मालाची यादी लिहायला सुरुवात केली. तिने ती यादी लिहून झाल्यावर माझ्या हातात दिली. आणि “जा घेऊन या लवकर सामान” अस म्हणून ती पिशवी घेण्यासाठी उठली.

आणि त्याच कागदाच्या मागील बाजूस मी कविता लिहिली. ती अशी….

 “माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा,

 माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात

 किराणा मालाची यादी लिहिते,

 ती यादीच

 माझ्यासाठी जगातली

 सर्वात सुंदर कविता असते…

 आणि यादीची समिक्षा

 फक्त आणि फक्त

 तो दुकानदारच करत असतो

 तो एक एक शब्द खोडत जातो

 पुढे आकडा वाढत जातो

 आणि कविता

 तुकड्या तुकड्याने

 पिशवीत भरत जातो

 आयुष्यभर माहीत नाही

 पण, कविता आम्हाला

 महिनाभर पुरून उरते

 कविता आम्हाला महिनाभर पुरून उरते”

 मित्रहो, संघर्षाच्या सुगंधी वाटेला सुद्धा वेदनेचे फास असतात. बंद डोळ्यांनाच फक्त सुखाचे भास असतात. पण जोडीदारावर अमाप माया आणि विश्वास ठेवला की, संसाराच्या या गाडीत बसून प्रवास करताना येणाऱ्या वादळात ही गाडी कधी थांबत नाही. आणि म्हणूनच उंबरठ्यावर भूक वेदनेचे अभंग गात असली तरीही आतल्या घरात नवरा बायकोने कायम आनंदाच्या ओव्या गात जगलं पाहिजे. यासाठी शब्दांचा लळा आणि आनंदाचा गळा हा असलाच पाहिजे. कारण, आयुष्य सुंदर आहेच आणि आयुष्याचं गाणं हे अशाच सुख दुःखाच्या सुरांनी नटलेलं असलंच पाहिजे.

चालत राहा आयुष्याचे आनंदगाणे हसत हसत गात राहा.

— समाप्त 

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आणि…कविता जिवंत राहिली… भाग – 1☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

 

? मनमंजुषेतून ?

☆ आणि…कविता जिवंत राहिली… भाग – 1 ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

तो दिवस आम्हा नवरा बायकोच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता. ती गरोदर होती सातवा महिना सुरू होता. निर्भय तिच्या पोटात वाढत होता. माझा तीन महिन्यापासून पगार झाला नव्हता. मी कंत्राटी कामगार होतो. आणि वेळ अशी आली होती, घरातलं सगळं राशन संपलं होतं. गॅस संपून आठ दिवस झाले होते. स्टोव्ह मध्ये शिल्लक राहिलेल्या रॉकेलवर ती काटकसर करून कसातरी दोनवेळचा स्वयंपाक करत होती. टीव्ही चा रिचार्ज संपला होता. त्यामुळे टीव्ही ही बंद होता. रोजचं येणारं दूध बंद केलं होतं. घरमालक सारखा भाडे मागण्यासाठी फोन करत होता. तीन महिने मी काहीतरी करून ढकलत आणले होते. तिच्या सोनोग्राफीला आणि दवाखान्याला बराच बराच खर्च झाला होता. गावाकडे आई वडील आजी आणि बहीण असायचे. तिकडे ही लक्ष द्यावे लागायचे. दिपालीने कधीच कसला हट्ट केला नाही. उलट जितकी काटकसर करता येईल तेवढी ती करत होती. आणि माझ्यासोबत लढत होती. परंतु आजची परिस्थितीच भयंकर होती. घरात थोडेसे तांदूळ शिल्लक राहिले होते. बाकीचे सगळे डब्बे रिकामे झाले होते. एका वेळची सोय होणार होती. आणि मी माझ्या सगळ्या मित्रांना फोन करत होतो. पण माझा फोन कुणीच उचलत नव्हतं. कारण, त्यांना माहीत होतं हा पैसे मागायलाच फोन करतोय. सगळ्यांकडून उसने घेऊन झाले होते. त्यांचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. एकाने फोन उचलला आणि मी बोलायच्या आधीच तो म्हणाला “नितीन थोडेफार पैसे असले तर दे ना, “मी काहीच उत्तर दिलं नाही फोन कट केला. आणि कुणालाच फोन करून काही होणार नाही. आपल्यालाच काहीतरी करावं लागेल असा मनात विचार करून मी खाली अंथरलेल्या चटईवर बसलो.

 तिची अंघोळ झाली होती. आम्ही पुण्यात पिंपळे निलख मध्ये भाड्याच्या रूममध्ये राहत होतो. टीव्ही बंद असल्यामुळे तिला करमत नव्हतं. तिचा मूड ठीक करण्यासाठी मी कधीतरी तिच्या आवडीचं “सुन्या सुन्या मैफलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे हे गाणं गुणगुणत असायचो. “मी गाणं गायला सुरवात केली, पण ती एकटक खाली मान घालून चटईवर बोट फिरवत होती. तिने लक्षच दिलं नाही. माझ्या कवितेवर ती फार प्रेम करते म्हणून कवितेच्या ओळी म्हणायला सुरवात केली तेव्हा, तिने झटकन माझ्याकडे रागाने पाहिलं. मी मान खाली घातली. घराच्या उंबऱ्यावर भूक हंबरडा फोडायला लागली की घराच्या आत जगातलं कोणतंच संगीत आणि कोणतीच कविता मनाला आनंद देऊ शकत नाही. हे कळलं.

 आम्ही बराच वेळ एकमेकांशी काहीच बोललो नाही. ती मान खाली घालून चटईवर बोटाने कोणती न उमटणारी अक्षरे गिरवत कुणास ठाऊक. सात महिन्याची गरोदर असणारी, एक नवा जन्म पोटात वाढवू पाहणारी, आई होण्याच्या उंबरठ्यावर असणारी दिपाली आमच्या बाळासाठी कदाचित एखादं नाव पुन्हा पुन्हा गिरवत असावी. मी तिच्या बोटाकडे एकटक पाहत होतो. ती स्वताला सावरत हळूहळू उठली. आणि दार उघडून बाहेर गेली. मी काहीच बोललो नाही. तिने शेजारच्या घरातून पेपर वाचण्यासाठी मागून आणला. कारण घरातली सगळी रद्दी या आठवड्यात तिने वाचून संपवली होती. रविवार होता पेपरला पुरवण्या होत्या. तिचा चेहरा थोडासा खुलला आणि ती पुन्हा खाली बसली.

 मी एकटक तिच्या डोळ्यात पाहत होतो. आणि ती पेपरची पाने चाळू लागली. आणि अचानक ती जोरात ओरडली. “ओ चंदनशिवे हे बघा काय आलंय पेपरला. “मी म्हणलं ‘काय दिपाली”? तर तिने मला विचारलं “काय ओ चंदनशिवे तुम्ही कवी आहात ना”? मी पार गळून गेलेल्या आवाजात म्हणलं “हो आहे पण काय करणार कवी असून आणि कविता तरी काय करणार आहे माझी” तिने हाताला गच्च धरून जवळ ओढलं आणि माझ्या समोर ते पेपरचं पान धरलं. आणि त्या पानावर असलेली जाहिरात मला आजही आठवतेय. !!अंशुल क्रियेशन प्रस्तुत, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय खुली काव्यवाचन स्पर्धा. !! रोख रकमेची तीन बक्षिसे. खाली पत्ता होता चिंचवड, पुणे. आणि संपर्क साधा म्हणून मोबाईल नंबर दिलेला होता. मी ती जाहिरात बघितली. दिलेल्या नंबरवर फोन केला. नाव सांगितलं. नावनोंदणी केली. आणि मी दिपालीकडे बघितलं तर तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक मला दिसायला लागली होती. ती म्हणाली, “चंदनशिवे घरात शेवटचे सत्तर रुपये आहेत. ते मी तुम्हाला देतेय. या स्पर्धेत जा. आजच स्पर्धा आहे ही. तिथं कविता म्हणा, आणि त्यातलं सगळ्यात मोठी रक्कम असणारं बक्षिस घेऊनच घरी या. पण एक सांगते आज, जर तुम्ही बक्षिस नाही मिळवलं तर संध्याकाळी या घरात फक्त नितीन चंदनशिवे आत येईल. कवी नितीन चंदनशिवे पुन्हा या जगात कुठं दिसला नाही पाहिजे. “तिच्या या वाक्याने माझ्या पोटातलं काळीजच कुणीतरी मुठीत गच्च आवळून धरल्यागत वाटायला लागलं.

 ती पुढे म्हणाली, “जर माझ्या संसाराला तुमची कविता राशन मिळवून देऊ शकत नसेल तर ती कविता मला या घरात नकोय. ” सात महिन्याची गरोदर असणारी, सर्वसामान्य गृहिणीसारखी सुखी संसाराची स्वप्नं पाहणाऱ्या दिपालीचं त्यावेळी काही चुकलं असेल असं मला अजिबात वाटत नाही. मी ते तिचं आवाहन स्वीकारलं. तिने घरातले जपून ठेवलेले सत्तर रुपये माझ्या

हातात देताना माझा हात घट्ट आवळून धरला आणि मला आतल्या आत हुंदका आला. मी अंगात कपडे घातले. तिच्या डोळ्यात बघितलं आणि निघालो.

 मी चिंचवडला आलो. बसच्या तिकीटला दहा रुपये गेले होते. तिथं प्रवेश फी पन्नास रुपये होती. ती भरली. ती भरत असताना माझ्या मनाच्या वेदना नाही मांडता येणार. परत जाण्यासाठी दहा रुपये शिल्लक राहिले होते. मी ते जपून ठेवले. बाजूला सर्वांसाठी नाष्ट्याची सोय केली होती. मला खावंसं वाटलं नाही. कारण ती घरात उपाशी होती. मी मनातल्या मनात हादरून गेलो होतो. मी स्पर्धेला आलो होतो खरा पण, आतल्या आत माझ्या कवितेची माझ्या पत्नीशी स्पर्धा सुरू झालेली होती. कारण इथं जिंकलो तरच माझ्या अंतरंगात कविता आयुष्यभर जिवंत राहणार होती. आणि हरलो तर, फक्त शरीर घेऊन मेलेल्या मड्यागत जगणं समोर दिसत होतं.

 स्पर्धा सुरू झाली. बराच वेळ होत चालला होता. इतरांच्या कविता मला ऐकूच येत नव्हत्या. कारण डोळ्यासमोर फक्त माझी गरोदर असणारी बायको दिसत होती. आणि उपाशी पोटाने तिने मला मारलेली “ओ चंदनशिवे” ही हाक ऐकू येत होती.

 माझं नाव पुकारलं गेलं. मी स्टेजवर जायला निघालो. तेव्हा, मी आयुष्यातला फार मोठा जुगार खेळायला चाललो होतो आणि डावावर कविता लावली होती. अन तेवढ्यात पायऱ्या चढून वर जाताना, स्टेजवर बाबासाहेबांचा आणि रमाईचा एकत्र असलेला फोटो दिसला. अंगावर काटा आला. अंग थरथर कापलं. विज चमकावी तसं मेंदूत काहीतरी झालं. रमाईला आणि बाबासाहेबांना डोळे भरून बघून घेताना अंगात बळ येत गेलं. इतकं बळ आलं की त्या क्षणाला मी जगातली कुठलीही स्पर्धा जिंकू शकत होतो. माझी तमाशा नावाची कविता बेंबीच्या देठातून सादर केली. कविता संपली. टाळ्या कानावर यायला लागल्या. त्याच टाळ्यांच्या आवाजात पुन्हा येऊन जाग्यावर बसलो आणि पुन्हा डोळ्यासमोर संसार दिसू लागला.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रावण – – – ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ रावण – – – ☆ श्री सुनील देशपांडे

आजकालच्या काळात प्रत्येक व्यक्तीमध्येच रावण निर्माण झालेला आहे. पूर्वी असं म्हणत की प्रत्येकामध्ये राम असतो. पण आता प्रत्येक जण दहा डोक्यांचा झालेला आहे. त्यातलं पहिलं डोकं तो त्याचं स्वतःचं घेऊन जन्माला आलेला असतो. त्यामुळे ते स्व-बुद्धीचे डोकं त्याचं स्वतःचं असतं. त्यानंतर एकेक डोकी त्याला चिकटत जातात आणि तो दहा डोक्यांचा होतो.

पुढील नऊ डोकी हळूहळू माणसाला चिकटतात… 

१) फेसबुक २) व्हाट्सअप ३) ट्विटर ४) इंस्टाग्राम ५) टेलिग्राम ६) यु ट्यूब  ७) गूगल ८) सिनेमा ९) वार्तापत्रे… 

या नऊ डोक्यांबरोबर स्वतःचे मूळ डोकं स्वबुद्धी हे दहावं डोकं संभ्रमित होत असतं. किंबहुना या दहाव्या डोक्याला संभ्रमित करण्यासाठीच इतर नऊ डोकी त्याला चिटकवली जातात. मग प्रत्येकाचाच रावण बनतो.

अर्थात रावण हा कुशाग्र बुद्धिमत्तेचा आणि उत्तम राज्यकर्ता होता असे प्रत्यक्ष श्रीरामांनीच म्हटले आहे. फक्त त्याचे स्वतःचे डोके ज्या ठिकाणी वरचढ ठरते तेव्हाच फक्त तो चांगला ठरतो. इतर नऊ डोकी जेव्हा त्याच्या स्वतःच्या मूळ डोक्यावर मात करतात म्हणजेच स्वबुद्धीवर मात करतात तेव्हा हातून पापकृत्य घडते….. म्हणूनच आज आपल्या प्रत्येकामध्ये एक रावण दडलेला आहे. आपलं मूळ डोकं वापरण्यात जर आपण यशस्वी झालो तर आपण जीवनात सत्कृत्य करू शकतो.

इतर डोक्यांचा आपल्यावर किती प्रभाव पडू द्यायचा हे ज्याने त्याने ठरवायचे आहे. आपल्याला रावणच बनायचे आहे. दुसरा पर्यायच नाही. परंतु सत्कृत्य करणारा रावण की दुष्कृत्य करणारा रावण एवढेच आपण ठरवू शकतो. आपल्याला राम बनता येणे शक्य नाही. कारण या इतर डोक्यांना आपल्याला दूर ठेवता येणे शक्य नाही. म्हणून किमान आपली स्वबुद्धी वापरायला शिकणं एवढंच आपल्या हातात आहे.

रावणाचा विनाश होत नसतो. आज दसऱ्याच्या दिवशी रावण जाळण्याचा उत्सव आपण करतो असे म्हणतो पण रावणाची मूर्ती जाळणारे अनेक रावणच असतात. त्यात राम कुठेही नसतो. त्यामुळे हजारो वर्षे रावणाचे दहन करून सुद्धा रावण आहेतच. राम कुठे दिसतो का ते जळणारा रावण पहात असतो. कारण त्याला रामाच्या हातून मृत्यू हवा असतो. तेवढे सद्भाग्य सुद्धा आज रावणाला मिळत नाही. अनेक जिवंत रावण मिळून एका रावणाच्या प्रतिकृतीला जाळत असतात.

… जेंव्हा रामाच्या हातून सद्गती मिळेल तेव्हाच रावण संपतील. राम केव्हा कसे आणि कधी निर्माण होतील हेच रावणांनी पाहणं त्यांच्या नशिबात आहे का ? तोपर्यंत मात्र… 

… रावण जलता है। …. रावण अमर है।

© श्री सुनील देशपांडे.

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares