मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जोडपी / जोड्या ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

??

☆ जोडपी / जोड्या ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

“ ए सोनू, तुमची जोडी अगदी स्वर्गातबनल्या सारखी आहे. अगदी इंग्रजी मध्ये म्हणतात त्याप्रमाणे “Made for each other ” … मिनू सोनूला सांगत होती…..

सोनू तिला म्हणाली की “ अग असे काही नसते…. जोड्या स्वर्गात जुळवल्या जातात आणि पृथ्वीवर त्या प्रत्यक्षात दिसतात असे म्हणतात ते खरे आहे… “ 

या दोघींचा संवाद ऐकून मी विचारमग्न झालो….

आजपर्यंतच्या आयुष्यात अनेक जोड्या पाहिल्या,

काही जवळून तर काही दुरून….

काही चित्रपटात तर काही प्रत्यक्षात..

काही नात्यातील तर काही परक्या….

… स्वतःची जोडी ही अशीच एका सावध/बेसावध क्षणी जुळली गेली….

आयुष्याच्या मध्यान्ह होताना असे लक्षात आले की जोड्या स्वर्गात जुळतात हे कदाचित खरे असेल, पण त्या या पृथ्वीवर जुळण्यासाठी, नव्हे जुळवून घेण्यासाठी मात्र काहीतरी वेगळे कौशल्य जोडीतील दोघांकडे लागते.

महान लेखक व. पू. काळे एका ठिकाणी लिहितात,

लग्न पत्रिकेवर गणपतीचे चित्र छापून आणि लक्ष्मी प्रसन्न असे लिहून संसार घरी लक्ष्मी रूपाने येणारी गृहलक्ष्मी होऊ शकत नाही. तर तिच्यातील लक्ष्मीची जागृती करण्याचे काम ज्या पतीला जमते, त्याचा प्रपंच सुखाचा होण्याची शक्यता असते.

पतीसाठी घरदार सोडून आलेल्या, नवऱ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलीला आपल्या नवऱ्याचे घर आपले वाटावे, किमान इतकं तरी त्या नवऱ्याने आणि सासरच्या माणसांनी तिच्याशी सौजन्याने वागले पाहिजे….

आधी संवाद, मग सहवास, पुढे त्यातून विश्वास आणि अकृत्रिम स्नेह…

आणि 

मुख्य म्हणजे प्रपंचात राहिलेल्या ‘गाळलेल्या’ जागा रिकाम्या न ठेवता ज्याला दिसतील त्याने मूक राहून भरणे…

हे यातील काही टप्पे असू शकतील….

एकेमकांना जाणून घेत, घरातील माणसांशी जुळवून घेत, दैनंदिन व्यवहारात प्रेम, माया, स्नेह जपत, वाढवत केलेला प्रमाणिक व्यवहार पती पत्नीचे नाते दृढ आणि उबदार करीत असतो आणि याला जर सम्यक सुखाची जोड मिळाली तर मग पती पत्नीच्या नात्याला बहार येते, मोगऱ्याचे ताटवे बहरू लागतात….

ज्या जोडप्यांनी, जोड्यांनी असे प्रयोग करून पाहिले असतील, अनुभवले असतील, लेख वाचताना त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित झळकले असेल….

प्रत्येकाने आपल्या जोडीदाराला समजून घेत आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करू….

आपल्याला नक्की जमेल…. शुभेच्छा!!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पावसाळी अमावस्येचा थरार… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? मनमंजुषेतून ?

☆ पावसाळी अमावस्येचा थरार… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

जुलै /ऑगस्ट महिना आला की, आत्ताही अंगाचा थरकाप होतो. आठवते ती एक भयाण रात्र. ३८ वर्षांपूर्वीची ! त्यावेळी मी  गडचिरोली येथे बँकेत नोकरी करीत होते. माहेरी खेड्यात राहणं होतं ! माझी नोकरी शाळेची नव्हती, की उन्हाळा, दिवाळी आणि सणावारी सुट्ट्या मिळायला. त्यात नशिबाने ऐन तारूण्यात एकल पालकत्व आलेलं. पण हरायचं नाही. एक आई असून – बापाचंही कर्तव्य पार पाडायचंच हे मनाशी कायम कोरलेलं होतं.

आषाढ आपल्या पूर्ण ताकदीनिशी कोसळत होता. त्याच्याच बरोबरीने विजा चमकत होत्या. बँक तशी सहालाच सुटली होती. तेव्हा पासून मी बसस्टॉपवर उभी होते. स्टँड नव्हे. एकेक बस येत होती. प्रवासी घेऊन पुढे जात होती. माझ्या बसचा मात्र  पत्ताच नव्हता. त्यातच स्ट्रीट लाईटस गेले. काळोख दाटला होता. बाळ लहान होतं. त्यामुळे मला जरी भूक लागली होती, तरी बाळाची काळजी अधिक होती. ते भुकेजलं असेल. सकाळी आई त्याला खाऊ घालायची, किमान रात्री त्याला मी हवी असे. माझ्या स्पर्शासाठी बाळ कासाविस झालं असेल. या कल्पनेनंच सारखं रडू येत होतं. छत्रीचे केव्हाच बारा वाजले होते. ओली गच्च पर्स कवटाळून मी बसची वाट बघत होते. नाही म्हणायला दोन / तीन पुरुष आणि एक बाई स्टॉपवर सोबत होती. रात्री बंद झालेल्या किराणा दुकानाच्या वळचणीला आम्ही थांबलो होतो. तेवढ्यात माझ्या माहेरची बस आली एकदाची. त्या बसच्या हेड लाईटसने एक दिलासा दिला.

त्यावेळी खेड्यात विवाहीत, त्यातून विधवा स्त्रीने ड्रेस वगैरे घालणं म्हणजे महापाप होते. साडी परकर गच्च ओले असल्याने पायांना चिकटले होते. कशीबशी लालपरी बसमधे मी चढले. दोन वेळा घंटी वाजली आणि बस सुरू झाली.

बसमधे जास्त प्रवासी नव्हतेच. म्हणजे तेवढेच थांबे कमी. म्हणजे बस लवकर गावी पोचेल हा कयास होता. बस वेगात निघाली, म्हणजेच खेड्यातल्या रस्त्यांवरून ताशी २० किलोमिटरच्या स्पीडने ! तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. अकरापर्यंत बस पोहचेल (अंतर ३४ किलोमीटर) हा कयास होता. कारण मोबाईल / फोन वगैरे काहीच प्रकरण त्यावेळी नसल्याने एकमेकांची काळजी करणे, एवढेच हातात होते. बसमधे जास्त लोक नव्हते, हे एकापरी बरंच होतं. कारण गच्च भिजलेली मी ! स्वतःला सांभाळणं मला कठीण झालं असतं.

गाडी सुरू झाली. तिच्या वेगापेक्षा कितीतरी जास्त वेगाने मी मनाने घरी पोचले होते. बाळ कसं असेल हीच काळजी होती. तसं ते माझ्या आईपाशी सुरक्षित होतं. पण आई आणि आजीत एका अक्षराचा फरक होताच ना!

आम्ही शिवणीच्या नदीपाशी आलो. नदीचं पात्र भरू वाहत होतं. वेळ रात्री दहाची. पण किमान पूल दिसत होता आणि गाडी पैलतिराला पोचली एकदाची. पुढे रस्त्यावर पाणी साचलेलं / खड्डे यातून वाट काढत गोविंदपूरचा नाला, पोहर नदी पार केली.

रात्रीचे अकरा वाजले होते. बाहेरचा सूं सूं असा आवाज रात्रीच्या भयानकतेत अधिकच भर घालीत होता. त्यातून विजा कडाडत होत्या. तशातही

“सरोष घन वर्षती तरूलताशी वारा झुजे

विराम नच ठाऊका तडित नाचताना विजे “

या ओळी मला आठवत होत्या. कुरूळ गाव आलं. दोन माणसं  उतरली. बसमधे ड्रायव्हर, कंडक्टर, एक शेतकरीवजा माणूस आणि मी एवढे चारच जण होतो. बसचा खडखड आवाज, टपावर पावसाच्या थेंबांचा आवाज भयानकतेत भर घालीत होता. कुरूळचा नाला दुथडी पुलावरून भरून वाहत होता. पण त्या पुलाचं अंतर जास्त नव्हतं. तशातच आमच्या बसच्याच समोर एक ट्रॅक्टर चालत होता. ड्रायव्हरने ट्रॅक्टर पुलावर घातला आणि पलिकडे गेला. तीच हिंमत धरून आमच्याही ड्रायव्हरने बस नाल्याच्या पलिकडे नेली. खूप हायसं वाटलं. आता मधे कुठलीच नदी / नाले नव्हते. कंडक्टर कडून माहिती कळली की एव्हाना रात्रीचे पावणेबारा झाले होते. अजून तीन किलोमिटर रस्ता बाकी होता.

कसाबसा सव्वा बारापर्यंत हा तीन किलोमीटर चा रस्ता आमच्या लालपरीने पार केला. एव्हाना मी खूप थकले होते. पहाटे पाचला उठून माझा डबा, घरच्या सर्वांच्या पोळ्या, भाजी करून ७ची बस घेऊन निघाले होते मी.. अर्थात ती बस पावणे आठला मला मिळाली आणि कसंबसं मस्टर गाठलं. जवळ जवळ १९ तास. मी केवळ काम करीत होते आणि उभी होते. गेले तीन तास बसचा खडखडाट अनुभवत होते हाडं खिळखिळी झाली होती. तशातच बस थांबली. म्हणजे माझं गाव आलं होतं. अमावास्येची काळी कुट्ट रात्र होती ती. पाऊस, विजेचं तांडवं, आभाळाची गर्जना यांच्यात जणु पैज लागली होती. तशाच पावसात भिजत मी खाली उतरले. माझा एकमेव सहप्रवासी माझ्या नेमक्या विरुद्ध दिशेने झपाझप पावलं टाकत निघून गेला होता. आजु बाजुला कुणी दिसतंय का याचा मी अंदाज घेतलला. पण रात्री साडे बाराला खेड्यात कोण असणार होतं ? 

रस्ता नेहमीचा परिचयाचा होता. आठवडी बाजारातून जाणारा. पण आता त्याला तलावाचं रूप आलं होतं. आमच्या शाळेला वळसा घालून त्याच तलावातून मला रस्त्यावर यायचं होतं. तेवढयात वीज चमकली आणि त्या उजेडत  मी कुठे आहे याचा मला अंदाज आला आता नाकासमोर चालत मला रस्ता गाठायचा होता अधेमधे दोन तीन वेळा वीज चमकली. आणि त्याच उजेडात मी चिखल पाणी तुडवत निघाले होते. पाच सात मिनिटात पायाला कडकपणा जाणवला. म्हणजे मी रस्त्याला लागले होते. होय सांगायचं विसरलेच. ओल्या गच्च चपलेने मधेच माझी साथ सोडली होती.

रस्त्यावरून माझी पावलं बऱ्यापैकी वेगात पडत होती. पाऊस सुरूच होता. मी सावकाराच्या घरापर्यंत पोचले न पोचले तोच अतिशय जोरात वीज कडाडली. कारण माझ्या नजरेसमोरची सर्व घरं मला दिसली होती. बहुतेक ती जवळपास पडली असावी. पण गंमत म्हणजे ज्या विजांची नेहमी भिती वाटावी त्याच विजा मला हव्याशा वाटत होत्या. कारण त्याच उजेडात मी चालत होते. मात्र आत्ताच्या विजेने मलाही धडकी भरली. मी एक टर्न घेतला. तिथे कोपऱ्यावर राममंदीर आहे. त्याच्याच जवळ एका घरी एक महिला काही दिवसांपूर्वी जळून वारली होती. खेडं म्हणजे भुताटकी वगैरे विषय आलेच. तिथेही ती बाई रात्रीबेरात्री, अवसे / पुनवेला दिसते हेही ऐकलं होतं. मी सगळं उडवून लावायची नेहमी. पण त्या रात्री तेवढा पॅच पार करताना मनातल्या मनात रामाचा धावा करीत होते. राममंदिर आलं हे मी जाणलं. कारण अंधारालाही उजेडाची एक किनार असते. पुढे आमच्या घराच्या फाटकाशी आले. आगळ काढून पुढे आले. पुन्हा आगळं लावली. जाळीच्या दरवाजातून कंदिलाचा उजेड दिसला आणि एक मानवी आकृती. म्हणजे माझे बाबा ! कारण आई बाळाला घेऊन झोपली असणार आणि धाकटा भाऊ सोळा सतराचा. तोही  झोपला असणार !

अंधारामुळे बाबांना मी दिसले नाही.. पण दरवाजाशी आल्यावर मात्र त्यांनी दार उघडलं. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. दाराचा आवाज ऐकून आईही बाहेर आली. बाहेर म्हणजे पडवीत. मला सुखरूप बघून दोघांचाही जीव भांड्यात पडला. चौकाच्या घरात आतल्या चार ओसऱ्या. तिथे आमची झोपायची सोय होती. बाळ झोपलं होतं.

मी गच्च ओली होते. बाहेरच साडीचा पदर, काठ जरासे पिळले. आणि घर अधिक ओलं होऊ नये ही काळजी घेत आत आले. आधी हातपाय धुवून ओली साडी बदलली.. आजीलाच आई समजून तिच्याच कुशीत बाळ निजलं होतं. आता त्याला उशी लावून आई उठली होती. बाळाच्या जावळातून मी हात फिरवला. पापा घेण्याचं टाळलं. कारण तो झोपला होता. तोवर आईने माझं ताट वाढलं रात्री एक वाजता चार घास खाल्ले.

बाळाला कुशीत घेतलं. ते चिकटलंच मला. दिवसभरचा शीण कुठल्याकुठे पळाला.

इथे संपलं नाही.

सकाळ झाली. पाऊस जरासा ओसरला होता. बाबा सवयीने  पहाटेच उठले होते. माझा ऑफिसला जाण्याचा प्रश्नच नव्हता. कारण रात्री ज्या खडतर मार्गावरून मी आले, ते सर्व नदीचे नाल्याचे पूल पुराच्या पाण्याखाली गेले होते.

आणि – – – काल रात्री जी जोरदार वीज चमकली, ती आमच्या शाळेवर पडली होती. त्यामुळे शाळेची एक भिंत खचली होती. गावातले अनेक टी. व्ही. उडाले होते. मी पायी चालत होते त्याच रस्त्यावर बाजूच्या घरी त्याच वेळे दरम्यान हृदय विकाराने एक आकस्मिक मृत्यू झाला होता.

बाबांनी हे मला सांगितलं आणि तेवढया थंडीतही मला दरदरून घाम फुटला. केवळ काही क्षणांपूर्वीच रात्री मी त्याच शाळेपाशी होते.  थोडी आधी वीज पडली असती तर? कल्पनेतही भिती वाटली. आणि कालची अमावास्या होती.

आजही ही आठवण आली की, उरात धडकी भरते. शिवकालीन हिरकणी आणि आजची आई यात खरंच फारसा फरक नाही हे पुन्हा अधोरेखित होतं हेच खरं!!

 

© प्रा.सुनंदा पाटील

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे आणि मी… एक आठवण—’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे आणि मी… एक आठवण — ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

आषाढ सरला श्रावण आला. कॅलेंडरचं पान उलटलं, आज नागपंचमीचा सण– लक्षात आल आजच्या दिवशी तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा वाढदिवस आहे. त्यांची शुभ प्रभात शुभेच्छामय करावी म्हणून मी फोनकडे धावले. पलीकडून खणखणीत आवाज आला, “‘ गुरुकन्या? सिंहगड रोड ना हो? “

“हो बाबासाहेब, मी तुमच्या माजगावकर सरांची कन्या. ” मी होकार भरला.

बरं का मंडळी ! बाबासाहेब नेहमी याच नावाने माझा आवाज ओळखायचे मी नवलाईने विचारल, ” बाबासाहेब  तुम्ही कसं ओळखलंत माझा फोन आहे ते?” इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतोय की आपण वयानी कितीही लहान असलो तरी बाबासाहेबांच्यातला विनय, प्रत्येकाला “अहो जाहोच” म्हणायचा. ते म्हणाले, “अहो अस्मादिकांचा आज जन्मदिवसआहे ना ! पेपरवाले  इतर काहीजण तारखेने माझा वाढदिवस साजरा करतात, पण नागपंचमी  तिथी साधून  तुमच्यासारखे हितचिंतक याच दिवशी मला भेटायला येतात. पण खरं सांगू, तुमच्या वडिलांनी, माझ्या गुरूंनी, म्हणजे माननीय   माजगावकर सरांनी शाळेत साजरा केलेला तो वाढदिवस कायम माझ्या मनांत कोरला गेला आहे. आत्ता मी तोच प्रसंग मनामध्ये आठवत होतो, आणि काय योगायोग बघा गुरूंच्या मुलीचा म्हणजे लगेच तुमचा फोन आला. मी तर म्हणेन तुमच्या आवाजात माझ्या सन्माननीय सरांनी हा शुभ संदेश माझ्यासाठी पाठवला असावा. “असं म्हणून श्री बाबासाहेब प्रसन्न- प्रसन्न हंसले. मलाही माझ्या वडिलांची आठवण झाली. आणि हो इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतोय की शिवशाहीर, पद्मभूषण, प्रसिद्ध इतिहासकार, श्री बाबासाहेब पुरंदरे हे माझ्या वडिलांचे म्हणजे श्री. माजगावकर सरांचे अतिशय आवडते पट्ट शिष्य होते.

माझ्याशी बोलतांना बाबासाहेब मागे मागे अगदी बालपणात, भूतकाळात, शालेय जीवनात शिरले, आणि मला म्हणाले, ” काय सांगू तुम्हाला ! माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय आणि बालमनांत कायम ठसलेला असा तो वाढदिवस श्री. माजगावकर सरांनी आणि माझ्या वर्ग मित्रांनी दणक्यात साजरा केला होता.

” तो प्रसंग जणू काही आत्ताच डोळ्यासमोर घडतोय. अशा तन्मयतेने  बाबासाहेब बोलत होते. इकडे माझीही उत्सुकता  वाढली.  आणि मी म्हणाले, ” बाबासाहेब मलाही सांगा ना तो किस्सा, माझ्या वडिलांची आठवण ऐकायला मलाही आवडेल “. खुशीची पावती मिळाली आणि ते पुढे सांगायला लागले,

” माझ्या वर्गमित्रांकडून सरांना माझ्या वाढदिवसाबद्दल कळले होते. त्यावेळी आत्तासारखा वाढदिवसाचा धुमधडाका नव्हता. औक्षवण हाच उत्सव होता. नव्या पोषाखात कपाळाला कुंकूम तिलक लावून मी वर्गात शिरलो, आणि सरांनी टाळी वाजवली. त्यांच्यात आधी ठरल्याप्रमाणे कदाचित तो वर्गाला इशारा असावा, कारण एका क्षणात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. सारा वर्ग त्या कडकडाटाने दुमदुमला, अक्षरशः दणाणला. अनपेक्षित झालेल्या या प्रकाराने मी गोंधळलो, हा काय प्रकार आहे म्हणून बावचळलो. सर हंसून पुढे झाले. त्यांनी मला जवळ घेतल, आणि म्हणाले, ” पुरंदरे आज वाढदिवस आहे ना तुझा? वर्ग मित्रांकडून तुला शुभेच्छा आणि माझ्याकडून तुला, हा घे खाऊ. “असं म्हणून श्रीखंडाच्या गोळ्या त्यांनी माझ्या हातावर ठेवल्या. “बाबासाहेब पुढे सांगू लागले, “अहो काय सांगू तुम्हाला, सरांनी दिलेल्या त्या श्रीखंडाच्या गोळीत अख्ख भूखंड सामावलं होत.  वर्ग मित्रांच्या टाळ्या, मनापासून दिलेली ती दाद, शंभर हातांकडून  मला शतशत शुभेच्छा मिळाल्या होत्या अजूनही तो आवाज माझ्या कानात घुमतो, आतापर्यंत छत्रपतीशिवाजी महाराजांबद्दल भाषण करून खूप टाळ्यांचा वर्षाव मी मिळवला. पण खरं सांगू! त्या वर्ग मित्रांच्या टाळ्यांची सर नाही येणार कशाला आणि सरांच्या त्या छोट्या एक इंचाच्या  गोळीपुढे ताटभर आकाराचा डेकोरेशन केलेला केकही  फिक्का पडेल. ” शिवशाहीर  त्या आठवणीत रमले होते, त्यांच्या आवाजात खंत जाणवली. ते म्हणाले “दुर्दैवाने आज ते सर, तो वर्ग, ते वर्गमित्र, आता आपल्यात नाहीत, पण ती आठवण दर वाढदिवसाला नागपंचमीला मी मनात  आठवतो. ” 

… हे सगळं मला सांगताना श्री बाबासाहेब गहीवरले, माझाही कंठ दाटून आला. आणि आम्ही फोन खाली ठेवला.

… धन्य ते माझे वडील, आणि धन्य ते गुरु शिष्याचं नातं जपणारे  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे.  

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दिवस आपल्यासाठी उगवतोच…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? मनमंजुषेतून ?

☆ “दिवस आपल्यासाठी उगवतोच…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

मी सातवीच्या वर्गात असताना माझ्या वर्गात गेल्या सहा वर्षांपासून नापास होणारा एकजण होता. आम्ही त्याला सगळेजण नाना म्हणायचो. तो आमच्याच गल्लीत राहायला होता. आमच्यापेक्षा वयाने खूप मोठा. मिशासुद्धा चांगल्याच वर आलेल्या होत्या. आणि हा नाना अंगाने धिप्पाडच्या धिप्पाड होता. जणू पैलवानच. म्हणजे आमचं मास्तर त्याच्या खांद्याला लागायचं. आणि पोरं त्याच्या गुडघ्याला. अंगाने दणकट असणारा नाना. पण अभ्यासात पार दरिंद्री. नानाला काहीच येत नव्हतं. आणि दरवर्षी नाना नापास व्हायचा.

त्यात आमच्या मास्तरने एक नियम असा केला होता, वर्गात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जो विद्यार्थी बरोबर देईल त्याने वर्गातल्या सगळ्या पोरांच्या मुस्काडीत मारायची. त्यावेळचे मास्तर असा नियम करायचे. आणि यात काय व्हायचं त्या भितीने सगळी पोरं मन लावून अभ्यास करायची. पण नानाच्या डोक्यात काहीच राहत नव्हतं. आणि त्याचा परिणाम म्हणजे नाना दररोज न चुकता वर्गातल्या प्रत्येकाचा मार खायचा. आणि पोरं पण नानाला मारताना जोरात रट्टा द्यायची. नाना डोळे गच्च मिटून हाताची घडी घालून उभा राहायचा. पोरांनी कधीच नानावर दया माया दाखवली नाही. मला मात्र नानाची फार कीव यायची. कारण नानाला कशाचंच उत्तर यायचं नाही.

तरीही नाना दररोज शाळेत न चुकता यायचा. उलट सर्वांच्या आधी नाना वर्गात हजर असायचा. सकाळी आलेला नाना व्यवस्थित दिसायचा. आणि शाळा सुटल्यावरचा नाना म्हणजे दोन्ही गाल लालभडक सुजलेले आणि डोळे पार रडून रडून खोल गेलेले दिसायचे. एक दिवस शाळा सुटल्यावर मी जवळ जाऊन नानाला विचारलं, म्हणलं “नाना कशाला शाळेत येतो?तुला काही येत नाही. रोज पोरं मारतात तुला. तू कुणाला काहीच बोलत नाहीस. मला कळत नाही एवढं सहन करूनसुद्धा तू कधी शाळा चुकवत नाहीस. कशासाठी हे तू करतोस. ?” त्यावर नानाने माझ्या डोक्यावर हात ठेवून केसातून हळुवार बोटे फिरवली. माझ्याकडे पाहत त्याने डोळे गच्च मिटले. डोक्यावरचा हात काढून घेतला आणि नाना तसाच पाठमोरा होऊन झपझप पावले टाकत निघून गेला. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नानाने दिलं नाही.

रोज शाळा भरत राहिली. आणि रोज नाना न चुकता मार खात राहिला. तोंड सुजवून घेत राहिला. मास्तरने प्रश्न विचारला की आपोआप नाना मनानेच उभा राहायचा अगदी तसाच डोळे गच्च मिटून. आणि मग ज्या पोरानं उत्तर बरोबर दिलेलं असायचं ते उड्या मारत नानाजवळ जायचं आणि खाडकन नानाच्या जोरात मुस्काडीत द्यायचं. पाचही बोटे नानाच्या गालावर जशीच्या तशी उमटायची. एवढ्या धिप्पाड नानाला मारलेल्या आनंदाने ते पोरगं लै उड्या मारायचं. आणि सगळी पोरं नानावर खी…खी…खीं.. दात इच्कुन माकडासारखी हसायची. आणि मी हे सगळं केविलपणे बघत बसायचो.

पण एक दिवस घडलं असं, मास्तरने एक प्रश्न विचारला, तो प्रश्न असा होता.

“गावाबाहेर बायका जिथं धुणं धुवायला जातात, त्या जागेला काय म्हणतात. ?”

आम्ही सगळ्यांनी जमेल तशी उत्तरे दिली, कुणी सांगितलं, ओढा म्हणतात, नदी म्हणतात, वगळ, आड, विहीर, तलाव, तळं, डबकं, पोहरा म्हणतात तर कुणी कुणी खूप डोकं खाजवून काहीही उत्तरे दिली. पण मास्तर उत्तर चुकीचं आहे असंच सांगत होते. नाना शांत बसून सगळीकडे पाहत होता. सगळ्यांची उत्तरे चुकलेली होती. गोंधळ शांत झाला आणि नानाने हात वर केला. जसं नानाने हात वर केला तशी सगळी पोरं एकसाथ मान वळवून नानाकडे बघायला लागली. मास्तर ही नानाकडे एकटक बघतच राहिले. कारण आज पहिल्यांदाच नानाने बोट वर केलेलं होतं.

 त्याच शांततेत नाना उभा राहिला. आणि हाताची घडी घालून नानाने मान ताठ करून उत्तर दिलं,

“गुरुजी गावाबाहेर बायका ज्या जागेवर धुणं धुतात त्या जागेला पाणवठा म्हणतात. “

आणि एका झटक्यात गुरुजी म्हणाले, ”नाना लेका तुझं उत्तर बरोबर आहे”. मास्तर जसं उत्तर बरोबर आहे म्हणाले तसा नानाने मोठा दीर्घ श्वास घेतला. गेल्या सहा वर्षांनंतर आज आज नानाचं उत्तर बरोबर आलेलं होतं. आणि नियमानुसार आज नाना सगळ्यांच्या मुस्काडीत मारणार होता. नानाचा एक हात किमान बारा किलो वजनाचा तरी नक्की असावा. त्याचं ते रूप बघून वर्गातली सगळी पोरं थरथर कापायला लागली. पळून जाण्यासाठी दफ्तर आवरायला लागली. नानाच्या लक्षात आलं. आणि पटकन दाराकडे धाव घेत वर्गाचं दार लावून दाराची आतली कडी लावली. त्याने कडी लावल्याबरोबर सगळी पोरं मोठ्याने बोंबलायला लागली. कारण नानाचा दणका बसल्यानंतर आयुष्यातून उठणार याची जाणीव प्रत्येकाला झालेली होती.

मी शांतपणे नानाकडे पाहत होतो. मलाही एक त्याची मुस्काडीत बसणार होतीच. पण मनातून मी खूप आनंदी झालो होतो. नानाचा चेहरा लालबुंध झाला होता. त्याचा हात सळसळत होता. डोळे मोठे झाले होते, आणि नाना आता सगळ्या वर्गावर तुटून पडणार होता. मास्तरानीच नियम केलेला असल्यामुळे मास्तर नानाला अडवूच शकत नव्हते. तरीही नानाचा तो राग पाहून मास्तर दबकतच हळूच नानाला म्हणाले, “नाना जाऊ दे सोड लेकरं लहान….. ” मास्तरचं वाक्य पूर्ण झालंच नाही. तोच नानाने अक्षरशः मास्तरला लहान मुलासारखं दोन्ही हाताने उचलून घेतलं आणि अलगद खुर्चीवर नेऊन ठेवलं. मास्तर घाबरून शांत बसले.

त्यानंतर गेल्या जवळजवळ सात वर्षाचा तो अन्याय नानाला आठवला. नानाने वर्गावर नजर फिरवली. त्याला आठवू लागलं. कुणी कुणी कसं हानलेलं आहे. कुणी किती छळेलेल आहे हे सगळं नानाने डोक्यात फिट्ट केलेलं होतं. नाना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आग फेकून पाहू लागलेला होता. पोरं हात जोडून ओरडत होती. नव्हे बोंबलत होती. मास्तरला विनवण्या करत होती. पण मास्तरचा नाईलाज होता.

नानाने सुरवात केली. एक एक पोरगं कॉलरला धरून नानाने उभं केलं नाही तर एका हाताने उचलून धरलं. आणि दुसऱ्या हाताने नानाने असं झोडपून काढायला सुरवात केली की बस्स. एका मुस्काडीत पोरगं भिंतीवर जाऊन आदळत होतं. आणि आडवं होऊन पडत होतं. ते बघून बाकीचे सगळे जोरात बोंबलत होते. नाना पेटलेलाच होता. सगळा वर्ग ओला होताना दिसायला लागला. त्याच्या एका रट्याने पोरं चड्डीत मुतून मुतून बोंबलत होती. काही पोरं ते बघूनच मारायच्या आधीच लघवी करत होती. मास्तर हात जोडून वर बघून काहीतरी डोळे झाकून बडबडत होते. नाना कुणाला सुट्टी देत नव्हता.

मी कधी नानाला मारलं नव्हतं. म्हणून नानाने माझ्या फक्त गालावर हात फिरवला. सगळ्यांना झोडपून झाल्यावर नाना त्याच्या जागेवर जाऊन बसला. सगळा वर्ग हमसून हमसून रडत होता. आणि नाना त्याच्या फुटलेल्या मिशिवर ताव मारत सगळीकडे बघत बसला होता. पोरं एकमेकांना सावरत होती. मास्तर टेबलावर मान टाकून गप्प पडून बसलेलं होतं.

मी हळूच नानाला चोरून पाहत होतो. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्याचा असा हसरा आणि सुंदर चेहरा आज मी पहिल्यांदा बघत होतो.

शाळा सुटली. रोज दंगा करत धावत पळत जाणारी पोरं जागेवरच बसून राहिली. फक्त नाना उठला आणि माझ्याजवळ आला. माझ्या हाताला धरून त्याने मला उठवलं. मी त्याच्यासोबत बाहेर आलो. त्याने त्याचं दफ्तर मला दिलं. आणि म्हणाला, “ राहू दे आता तुलाच दफ्तर, मी शाळा सोडली आजपासून. उद्यापासून येणार नाही. तू मला विचारलं होतं ना की शाळा का सोडून देत नाहीस? तर यासाठी सोडत नव्हतो. कारण मला माहित होतं. एक ना एक दिवस तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल. एक ना एक दिवस तरी माझ्यासाठी दिवस उगवल. त्या दिवसाची वाट बघत होतो. आणि आज तो दिवस आला. ” माझ्या नाजूक गालावर त्याने हात फिरवला. आणि नाना शाळेच्या मैदानातून शांतपणे निघून गेला.

दोस्त हो, गोष्ट संपली. पण फार मोठी शिकवण नानाने दिली. जोपर्यंत सहन करायचा काळ असतो तोपर्यंत सहन करत रहा. कारण आपला दिवस येणारच असतो त्या दिवसाची वाट पहात रहा.

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ असंही अनोखं बक्षीस… ☆ श्री मनोज मेहता ☆

श्री मनोज मेहता

? मनमंजुषेतून ?

☆ असंही अनोखं बक्षीस… ☆ श्री मनोज मेहता 

माझी फोटोग्राफी १९७२ ला सुरु झाली, डोंबिवलीतील फारसं कोणीच माझ्या ओळखीचे नव्हतं. पण दोन नावं कायमच लक्षात राहिली ती म्हणजे, श्री. मधुकर चक्रदेव व श्री. बापूसाहेब मोकाशी. कारण डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या उद्घाटनानंतर, ते आमच्या घरी आले होते. घरी येताच मला पाहून म्हणाले, काल तूच आला होतास ना फोटो काढायला ? माझ्या मोठ्या भावाला म्हणजेच क्रांतीला सांगत होते, एकदम तयार आहे हं तुझा भाऊ! रिबीन कापताना म्हणाला, माझ्याकडे बघू नका, रिबिनीकडे बघा, आम्हाला त्याचं खूप कौतुक वाटलं आणि पाहुणेही खूष झाले.

नंतर – नंतर डोंबिवली लायन्स क्लब मध्ये पण हेच दोघं, त्यामुळे माझी ओळख घट्ट झाली. बँक व लायन्स क्लब यांचे डोंबिवलीत भरपूर कार्यक्रम असत, यामुळे मला त्यांच्या कार्याची थोडी – थोडी ओळख होऊ लागली. असे करता करता लायन्स क्लबने एक हटके कार्यक्रम १९८० ला सुरु केला होता. डोंबिवलीत शालांत परीक्षेत ७५% व त्यापेक्षा जास्त मार्क ज्यांना मिळालेत त्या सगळ्यांचा आणि बोर्डात आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा. हा उपक्रम खूप गाजू लागला, पुढे जाऊन ७८%, ८०%, ८५%, मला आठवतंय लायन्स क्लबला ९२% पर्यंत जावं लागलं ही डोंबिवलीच्या मुलांची हुशारी सर्व महाराष्ट्रात गाजली होती.

अहो, मी १९७६ ला झालेल्या ssc परिक्षेत गचकलो की, आणी मग त्वेशाने ऑक्टोबर मध्ये सॉलिड अभ्यास करून माझ्या शाळेत पहिला आलो होतो ना राव ! मी शाळेत पहिला आलो कारण सर्व विषय घेऊन मी एकटाच परीक्षेला बसलो होतो म्हणून हं ! तेव्हापासूनच मी धैर्यवान आहे. आणि वार्षिक स्नेहसंमेलनात मला बोलावून शाळेनी २५१/- रुपयांचं पाकीट दिलेलं स्मरणात होतं. हाच धागा पकडून मी ठरवलं किती मार्क मिळवतात ही मुलं, आपणही यांना छान बक्षीस देऊया.

१९८९ ला मी डोंबिवलीतील आद्य गुरुजी व प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ श्री. सुरेंद्र बाजपेई सरांना भेटून माझी कल्पना सांगितली. लगेच म्हणाले, व्वा मनोज व्वा, बढिया बक्षीस आहे. मी तुला रिझल्ट लागल्यावर डोंबिवलीतील सर्व बोर्डात आलेल्या मुलांची नावं, पत्ता व दूरध्वनी क्र. पाठवतो. इतके व्याप असताना लक्षात ठेवून रिझल्ट आल्यावर, केवळ तीन तासात शिपायाबरोबर सर्व माहितीचं पाकीट माझ्या घरी हजर असायचं. सर सर, मानाचा मुजरा तुम्हाला 🙏  हे मी इथं लिहितोय, तेही तुम्हाला आवडणार नाही. तुमच्या हयातीत असं लिहिलं असतं तर, ‘पुढच्या वर्षी माहिती पाहिजे की नको’, अशी जोरदार धमकीच मिळाली असती मला.🙏🏻

मग एक एक मुलांच्या घरी दूरध्वनी करून, मग त्यांच्या वेळेनुसार एक गुलाबाचं फुल व कॅडबरी घेऊन मला एकट्यालाच जणू आनंद झाल्यासारखा मी त्याला / तिला अभिनंदन असं ओरडून शुभेच्छा द्यायचो. मी मनोज मेहता, तुमचा फोटो काढायला आलोय हं ! काय सांगू तुम्हाला, बोर्डात पहिला येवो किंवा विसावा, अहो मला त्यांना हसवता हसवता वाट लागायची. आणि तेव्हा रोलकॅमेरा, ३-४ मस्त हसवून हसवून फोटो काढायचे आणि डेव्हलप करून त्यातील एक छान ८ X १० आकाराचा फोटो लॅमिनेशन करून ठेवायचो. त्यावर फक्त पुढे “शुभेच्छा” इतकंच लिहायचो. माझं नांव कुठेही नाही हं ! मग लायन्स क्लबचा कार्यक्रम असला की मी हे फोटो घेऊन त्यांनी बोलावलेल्या पाहुण्यांच्या हस्ते त्या मुलांना द्यायचो. हळूहळू माझी ही कीर्ती साऱ्या डोंबिवलीभर पसरली आणि चक्क मुलं अभ्यासाला लागली की! मला नक्की आठवत नाही साल, पण ९४/९५ असावं, डोंबिवलीतून ५२ मुलं बोर्डात ! पार्ल्याचा विक्रम मोडीत काढून इथेही डोंबिवलीकर मुलांनी बाजी मारली. मग मी ही घाबरलो नाही, बाजपेई सरांच्या कृपेने सर्वांच्या घरी जाऊन, तितक्याच उत्साहात मी फोटो काढले. आणि त्यावर्षी पाहुणे म्हणून श्री. विश्वास मेहेंदळे व श्री. अविनाश धर्माधिकारी हे होते. भाषणात मेहेंदळे म्हणाले मेहतांचं बरंय ‘आवळा देऊन कोहळा’ काढायचा. Microsoft - Fluent Emoji (Color)अन् त्यांच्या पाठोपाठ श्री. धर्माधिकारी बोलले, ‘ मेहेंदळे मी मुलांना भेट म्हणून दिलेला फोटो नीट पाहिला आहे, तुम्ही चुकीचा निष्कर्ष काढला. मेहतांचं हे मोठेपण आहे की त्यांनी कुठेही त्यांचं नांव लिहिलेलं नाही, अश्या प्रकारचं बक्षीस आजपर्यंत कोणीही दिलेलं माझ्या स्मरणात नाही, अशी माणसं सध्याच्या जमान्यात मिळणार नाहीत. मी काय व किती केलं, हे ओरडून सांगणाऱ्यांचीच संख्या वाढत आहे. म्हणून मेहताजी मी तुम्हाला नमस्कार करतो. ४०० मुलं व त्यांचे पालक व लायन्स मंडळी मिळून ७०० संख्येने भरलेल्या भरगच्च सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. नंतरची काही वर्ष लायन्स क्लब बंद होता. मग मी स्वतः माझ्या घरी बोर्डात आलेल्या मुलांना बोलावून बक्षीस द्यायचो. पुढे पुढे माझ्या घराचा हॉलही कमी पडू लागला. मग मी श्री. व सौ. पाठक यांना विनंती केली आणि त्यांनी सर्वेश सभागृह, नाश्ता व चहा विनामूल्य तर दिलाच, शिवाय मुलांना टायटन घड्याळं पण दिली. मंडळी त्यावर्षी माझे ज्येष्ठ पितृतुल्य मित्र, श्री. शं. ना. नवरे यांना पाहुणे म्हणून बोलावलं होतं. १८ विद्यार्थी व त्यांचे पालक व माझ्या घरची मंडळी व केवळ ४ मित्र असे आम्ही ५०/६० जणंच होतो. कार्यक्रम सुरु झाला आणि नवरे काकांनी एकेक मुलाला/मुलीला माझं बक्षीस द्यायला सुरुवात केली. बक्षीस देताना ते मुलांशी संभाषण करायला लागले. म्हणाले, आमच्या मनोजकडून तुमचं कौतुक खूप ऐकलं म्हणून मी आलो हं ! मी तुम्हांला बक्षीस देताना तुमचा चेहरा व फोटोतील चेहरा निरखून पाहात होतो. इतका सुंदर फोटो मनोजने काढून तुम्हाला दिला, कारण तुम्ही हुशार व छान आहात. आता गंमत अशी आहे, आमच्या मनोजनं दिलेलं असं बक्षीस तुम्हाला कोणीच देणार नाही, अन त्यानं दिलेलं हे बक्षीस कायम स्वरूपात राहिल. तर नीट ऐका हं, तुम्हाला दिलेल्या सुंदर फोटोतील चेहऱ्यापेक्षा, तुमचं जीवन तुम्ही अधिक सुंदर बनवून दाखवाल, असा मी तुम्हाला आशीर्वाद देतो.

मी कधीही मुलांच्या सत्काराचे फोटो व प्रसिद्धीच्या मागे पडलो नाही. बऱ्याच वर्षांनी हीच मुलं मला रस्त्यात भेटतात व पाया पडतात, आता तर त्यांनाही मुलं झालीत. पण मला व माझ्या कुटुंबासाठी हा कार्यक्रम म्हणजे टॉनिक होतं, ते नेमकं महाराष्ट्र शासनाने हिरावलं. आपला शालांत परीक्षेचा निकाल शाळेत बघण्याची आणि आवडत्या शिक्षकांना, मित्र मैत्रिणींना भेटायची इच्छा, आनंद, सगळं काही या ऑनलाईनने हिरावून घेतलं.

पण तो १७/१८ वर्षांचा माझ्या कुटुंबासाठी सुवर्णकाळच होता, बस्स त्या स्मृतीतच रमायचं आता !

© श्री मनोज मेहता

डोंबिवली  मो ९२२३४९५०४४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ७ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – ७ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टूडे)

नलुआत्या— बेबीआत्या

आम्ही राहत असलेल्या गल्लीत दोन मथुरे नावाचे परिवार होते. एक कोपऱ्यावरचे मथुरे आणि दुसरे शेजारचे मथुरे. त्यांचे एकमेकांशी चुलत नाते होते पण फारसे सख्या मात्र नव्हते. एकमेकांविषयी दोघेही बोटं मोडूनच बोलायचे. कोपऱ्यावरचे मथुरे यांचं फारसं कुणाशी सख्य नव्हतं पण दुसऱ्या मथुरेंच्या घरी आम्हा मुलांचा अड्डा जमायचा आणि त्याला कारण होतं “बेबी आत्या आणि नलुआत्या”. त्यांच्या आईंना आम्ही “काकी” म्हणायचो. सावळ्या, उंच, कृश बांध्याच्या, व्यवस्थित चापूनचोपून सुती नऊवारी लुगडं नेसणाऱ्या काकींचा तसा गल्लीत दरारा होता. काकी पाकनिपुण होत्या. त्यांच्या हातची मसुराची आमटी मला फार आवडायची. ढणढण पेटलेल्या चुलीतली लाकडं थोडी बाहेर काढून बीडाच्या तव्यावर सुरेख, मऊसूत तेलावर लाटलेल्या सुंदर पुरणपोळ्या निगुतीने भाजत. तो केशर वेलचीयुक्त सुगंध आजही माझ्या नाकात आहे. काकी उपासतापास, अनेक धार्मिक व्रतवैकल्ये करायच्या. सगळ्यांशी फार जवळिकतेने नसल्या तरी गोडच बोलायच्या.

मात्र काकींविषयी गल्लीत कुणकुण असायची. काकी म्हणे पहाटेच्या प्रहरी उठून ओलेत्याने पिंपळाच्या वृक्षाभोवती उलट्या फेऱ्या मारतात. त्यांना मंत्रतंत्र ज्ञान कळतं. त्या करणी करतात. “करणी कवटाळ काकी” अशी संबोधनं त्यांच्या बाबतीत वापरलेली कानावर यायची पण त्याचबरोबर त्या ही सर्व कर्मकांडं का करतात याच्या कारणांचीही चर्चा व्हायची.

“दोन प्रौढ कुमारिका आहेत ना घरात! त्यांची लग्न कुठे जमत आहेत ? वयं उलटून गेली आता कोण यांच्याशी लग्न करणार आणि जमलं तरी घोडनवऱ्याच ना ?” असं काहीबाही अत्यंत अरोचक भाष्य कानावर पडायचं. ते गलिच्छ वाटायचं आणि ते ज्यांच्या अनुरोधाने उच्चारलं जायचं त्या नलुआत्या आणि बेबीआत्या आम्हाला तर फारच आवडायच्या. त्याचे कारण, वयातलं अंतर विसरून त्या आमच्याबरोबर सापशिडी, गायचोळा, सागरगोटे, काचापाणी, पत्ते असे अनेक बैठे खेळ अतिशय मनापासून खेळायच्या. आम्हाला काही बेबी आत्याचा काळा वर्ण, बोजड कुरळे केस अथवा नलुआत्याचे जरा जास्तच पुढे आलेले दात, किरकोळ शरीरयष्टी, विरळ केस हे सारं कुरूप अथवा असुंदर आहे असं वाटायचंही नाही. खरं सांगायचं तर बालमनाला भावणारं, आकर्षित करणारं जे काही असतं ना ते समाजाच्या वैचारिक चौकटीत बसणारं नसतंच. आमच्यासाठी नलूआत्या आणि बेबी आत्या तशा होत्या. कुठलंही रक्ताचं नातं नव्हतं. मैत्रिणी म्हणाव्यात तर वयात खूप अंतर होतं पण प्रत्येक वेळी नात्याला नाव असलंच पाहिजे का ? वय, रूप यापलिकडचं, नावाशिवाय असलेलं हे नातं मात्र खूप हवंस, सुरक्षित आणि गोड होतं. बालपणीचा एक आनंददायी कोपरा होता.

माझी मोठी बहीण अरुणाताई हिला तर मी “मुक्काम पोस्ट बेबी आत्या आणि नलुआत्या” असंच म्हणायचे. काय असेल ते असो पण ताईचं आणि त्यांचं विशेष नातं होतं. खरं म्हणजे ताई तर मुंबईला आजोबांकडे राहायची पण जेव्हा ती घरी यायची तेव्हा पहिली धावत बेबीआत्या— नलुआत्यांकडे जायची आणि त्याही तिच्या आवडीचं, ती येणार म्हणून काही मुद्दामहून केलेलं तिला प्रेमाने भरवायच्या. पुढे घडलेल्या ताईच्या प्रीती विश्वात या दोघींचा सक्रिय वाटा होता हेही नंतर कळले. दोघांच्याही नंतरच्या आयुष्यात अनेक स्थित्यंतरे, स्थलांतरे झाली पण हा जिव्हाळा, हे प्रेम आयुष्यभर टिकून राहिले हे विशेष. एकमेकांना भेटण्याची त्यांची प्रचंड धडपड मी अनुभवलेली आहे. तो आनंद, त्या मिठ्या, अश्रु आजही दृष्टीत आहेत. काय होतं हे ? काय असतं हे ? कोणतं नातं ?

नलुआत्या आणि बेबीआत्या या दोघीही कलाकारच होत्या. सुरेख भरतकाम करायच्या. त्यांच्या दारावर लावलेल्या एका पडद्यावर एक सुरेख रेशमाच्या धाग्याने विणलेली बाई म्हणजे उत्कृष्ट भरतकामाचा नमुना होता. संक्रांतीत चौफेर फुललेल्या काट्यांचा, पांढराशुभ्र तिळगुळ त्या करायच्या. ती कल्हई लावलेली पितळेची परात, मंद पेटलेली शेगडी, थेंब थेंब टाकलेलं साखरेचं पाणी आणि त्यावर हळुवार हात फिरवत फुलत चाललेले ते तिळाचे दाणे माझ्या नजरेत आजही आहेत. इतका सुंदर तिळगुळ मी त्यानंतर कधीच पाहिला नाही.

मनाच्या स्मरण पेटीत ठळक गोष्टी तशाच्या तशा टिकल्या असल्या तरी अनेक गोष्टी पुसूनही गेल्या असतील पण आज हे लिहिताना मला वेगळ्या जाणिवा जाणवत आहेत. माझं आणि माझ्या सवंगड्यांचं त्यांच्याभोवती एक बालविश्व गुंफलेलं होतंच पण त्या दोघींच्या भावविश्वात आम्ही होतो का ? तेवढी आमची मानसिक क्षमता नव्हतीच. त्या वयात तेव्हा एवढेच कळत होतं की या दोघींसाठी “वर संशोधन” चालू आहे आणि त्यांची लग्नं काही जमतच नाहीत. “त्यांची लग्नं” हा गल्लीतला त्यावेळचा महत्त्वाचा चर्चेचा विषय होता. नकाराच्या अनंत फेऱ्यात त्यांच्या मनाच्या काय चिंध्या झाल्या असतील इथपर्यंत तेव्हा आम्ही पोहोचू शकलो नाही. पण घोडनवऱ्या, प्रौढ कुमारिका हे शब्द मात्र खूप सतावायचे.

त्याच काळात एक धक्कादायक घटना गल्लीत घडली ती म्हणजे ठाण्यातील प्रसिद्ध “मराठे सोनारां”च्या दुकानात काम करणाऱ्या भाई नावाच्या तरुणा बरोबर बेबीताईने पळून जाऊन लग्न केले. एका उच्च जातीय मुलीने एका बॅकवर्ड जातीच्या मुलाशी अशा पद्धतीने लग्न करणं हा फार मोठा गुन्हाच होता जणू ! जबरदस्त धक्का होता. काकीने तर अंथरूणच धरलं.

“समाजात तोंड दाखवायलाही जागा ठेवली नाही.. ”

“काकीच्या उपवासतापासाचा काय परिणाम झाला ? करण्या केल्या ना ? भोगा आता ! असं दुसऱ्यांचं वाईट करून स्वतःचं भलं होत नसतं.. ”

अशा अनेक उलटसुलट भाष्यांचे प्रवाह कानावर आदळत होते. काहीसं नकोसं, भयंकर घडले आहे एवढंच जाणवत होतं आणि नलुआत्याची यावर काय प्रतिक्रिया होती ? तिला दुःख, आनंद, द्वेष काय जाणवत होतं ?

ती इतकंच म्हणाल्याचं मला आठवतंय, ” बरं झालं ! निदान बेबीचं लग्न तरी झालं. ”

या वाक्याच्या आत तिच्या मनातलं, “माझं काय आता ?” हे ऐकू येण्याचं कदाचित माझं वय नव्हतं.

मात्र या घटनेनंतर नलुआत्याने वर संशोधन या विषयात पास होण्यासाठी अनेक धाडसी प्रयोग केले. कुरूपत्वात भर टाकणारे पुढे आलेले दात दंतचिकित्सकाकडे जाऊन काढून घेतले. किती वेदना तिने सहन केल्या. त्यावेळी या शस्त्रक्रिया कुठे प्रगत होत्या ? असं काही करून घेण्याचा ट्रेंडही नव्हता. यावरही समाजाचे कुत्सित फिदीफिदीच असायचे. डोक्यावर कृत्रिम केसांचा भारही नलुआत्याने चढवला. छान, तलम, रंगीत साड्या नेटकेपणाने आणि जाणीवपूर्वक ती नेसू लागली. आहाराकडे लक्ष देऊ लागली. कपोल, कटी, वक्ष या अवयवांची जपणूक करू लागली. या नव्या नलुआत्याच्या आतली नलुआत्या मात्र कुठेतरी हरवत चाललेली आहे असे त्यावेळी वाटले. कधीकधी ही नवी नलुआत्या खूप केविलवाणी, खचलेली ही वाटायची. मात्र या तिच्या सर्व प्रयत्नांची फलश्रुती परिणामकारक झाली. अखेर स्वजातीतला, मध्यमवर्गीय, नोकरी असलेला, संसाराची जबाबदारी सांभाळण्यास सक्षम असणाऱ्या एका साध्या परिस्थितीतल्या कुटुंबातल्या, प्रथमवर प्रौढवयीन, सज्जन मुलाशी नलुआत्याचे लग्न जमले.

“चि. सौ. कां. नलिनी मथुरे” असे पत्रिकेवर नाव झळकले आणि समस्त गल्लीने या अति प्रतिक्षित विवाह सोहळ्यास जातीने हजेरी लावून “शुभमंगल सावधान” म्हणून आनंदाने मंगलाक्षता उधळल्या.

या विवाहास आमंत्रण नसतानाही बेबीआत्याने चोरून हजेरी लावली होती आणि नलुआत्याने तिला भर मांडवात मिठी मारली होती— हे दृश्य मी आजही विसरलेले नाही.

या सगळ्या घटनांचा आज जेव्हा मी विचार करते तेव्हा त्याविषयी खूप काही बोलावसं वाटतं.

बेबीआत्याने खालच्या जातीतल्या मुलाशी पळून जाऊन लग्न केलं हे चुकलं का ? जातीधर्माचा इतका पगडा का असावा की तो गुन्हाच ठरावा ? ती असहाय्य होती म्हणून तिच्या हातून हे अविवेकी कृत्य घडले का ? ती समाजाच्या दृष्टीने सुखी नसेलही पण तिने तिच्या आयुष्याशी केलेली तजजोड तिच्यासाठी समाधानकारक असेलही. यात जातीचा संबंध कुठे येतो ?

त्यावेळी लपत छपत एक विचार माझ्या मनात आला होता की मुलीचं लग्न जमणं, ते होणं किंवा न होणं हे इतकं मोठं आयुष्याची उलथापालथ करणारं आहे का ? पुढे भविष्यात आपल्यावरही जर अशी वेळ आली तर ? घोडनवरी, प्रौढ कुमारिका ही कळकट विशेषणे आपल्या पदरी आली तर ? तर यावर मात करायला हवी. व्यक्तिमत्त्वाची मजबूत घडण करून स्वतःला सिद्ध करता आले पाहिजे. समाजाच्या अशा हीन प्रहाराचे बळी न ठरता वेगळ्या वाटेवरून जाता आले पाहिजे, वेगळे आदर्श निर्माण करायला हवेत.

प्रातिनिधिक स्वरूपात जेव्हा मी बेबी आत्या आणि नलुआत्यांना पाहते तेव्हा जाणवतं की त्यांच्यात अनेक कला होत्या. त्या कलांना त्याकाळी वाव मिळाला असता तर किंवा त्यांनीच त्यांच्यातील असलेल्या गुणांचा आदर राखून त्यांना अधिक प्रगत करून एक समर्थ आयुष्याची वाट आखली असती तर ? स्वसन्मान, स्वतःची ओळख मिळवण्याचा प्रयत्न केला असता तर ? कदाचित त्या काळासाठी ते आव्हान असेल पण अशक्य होते का ? केवळ लग्न होणे ही एकमेव इतिश्री होती का आयुष्याची ? आज मुलींसाठी बदललेला काळ अनुभवत असताना हे तुलनात्मक विचार मनात जरूर येतात. आज लिव्ह—ईन—रीलेशनपर्यंत पर्यंत काळ पुढे गेलेला आहे. पण त्याचबरोबर अजूनही “लग्न” या विषयावर व्हावे तितके विचारमंथन झालेले दिसत नाही. समाजाच्या डोळ्यातली भिंगं व्हावी तितकी स्वच्छ झालेली वाटत नाहीत. “प्रौढ कुमारिका” या शब्दामागचं भीषण वास्तव निपटलेलं नाही वाटत.

पण बालपणीच्या या घटनेनंतर स्त्रीसक्षमता म्हणजे काय या विचारांचा एक झरा माझ्या मनात त्या वेळेपासून उसळला होता हे नक्की.

I WILL NEVER GIVE UP हे मात्र मी नकळत ठरवलं होतं…

क्रमश: भाग सातवा 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नववधू प्रिया मी बावरते— ☆ सौ. राधिका (माजगांवकर) पंडित ☆

सौ. राधिका (माजगांवकर) पंडित 

? मनमंजुषेतून ?

☆ नववधू प्रिया मी बावरते — ☆ सौ. राधिका (माजगांवकर) पंडित

श्रावण धारा कोसळत होत्या अंगणात ऊन पावसाचा खेळ सुरु होता, तर माझ्या मनात त्या मंगळागौरीच्या आठवणींचा फेर चालू होता.

त्याचं असं झालं, भाऊजींचं लग्न झालं आणि जावेच्या रुपानें मैत्रीण म्हणून बिल्वा आमच्या घरांत आली. पहिला वहिला सण आला मंगळागौरीचा. भाऊजींची आणि बिल्वाची नव्याची नवलाई अजून ताजी, साजरी, गोजरी आणि लाजरी अशी टवटवीत होती. चोरटे स्पर्श, कुठं बिल्वाची लांबसडक वेणी ओढ, तर कधी पाणी उडव: असे चोरटे क्षण ते  दोघेजण लाजून साजून साजरे  करत होते.

सौ. बिल्वा खूप साधी आणि मुलखाची लाजाळू होती. सासु- सासरे समोर असले की ही नवऱ्याच्या वाऱ्याला ही उभी राहात नसे. भाऊजींना चहा देतांना सुद्धा या लाजाळू  झाडाच्या पापण्या खाली झुकलेल्याच असायच्या. तिचं म्हणणं “वडिलधाऱ्यां समोर बरं दिसतं कां हे असले अल्लड अवखळ वागणं ?”

तर अश्या या बिल्वाची, माझ्या जावेची पहिली मंगळागौर होती. दोन्ही घरचे पाहुणे उपस्थित झाले होते. हिरव्यागार शालूमध्ये ठसठशीत दागिन्यांमध्ये आमची ही नववधु चौरंगावरच्या मंगळागौरीइतकीच सजली होती. अतिशय सुंदर दिसणाऱ्या आपल्या बायकोकडे भाऊजींची नजर पुन्हा पुन्हा वळत होती. भाऊजींच्या खाणाखुणांना दाद न देता या बाईसाहेब त्यांना नजरेनीच दटावत होत्या.

दिवसभराचा कार्यक्रम संपला. आता आली झिम्मा फुगडी खेळण्याची वेळ. तेव्हा मात्र हे लाजाळूचं झाड संकोच सोडून अवखळ वारं झालं होतं.

सगळ्यांबरोबर सगळे खेळ अगदी दणक्यात, अगदी देहभान विसरून खेळले गेले. तिची ती भरारा फुगडी बघून कुणी तरी म्हणालं, “चल बाकीचें राहूदे, आता तुझ्या नवऱ्याला गरागरा फिरव. “

“इश्य !”असं म्हणून पळायच्या बेतात होत्या बाईसाहेब. पण भाऊजींनी मात्र हात धरून तिला मैदानातच आणलन. सभोवती आम्ही लगेच फेर धरला आणि ओरडलो, “भाऊजी सोडू नका हं हिला. ” आणि मग काय भाऊजींना तेच तर पाहिजे होते.

बोलताबोलता पायांचा ताल आणि फुगडीचा वेग यांनी सूर धरला. मग रिंगणांत नवराबायकोची फुगडी चांगलीच रंगली. अगदी दणदण दणक्यात.

कशी कोण जाणे, बिल्वाला एकदम भोंवळ आली आणि ती भाउजींच्या अंगावर कोसळली. त्यांनी तिला सावरलं.

बराच वेळ झाला, ती दोघं दूर होईनांत. आम्हाला वाटलं भाऊजी तिला सोडत नव्हते म्हणजे मस्करीच चाललीय.

मध्येच कुणीतरी वडिलधारं ओरडलं, “अरे तिला चक्कर आली असेल. खाली बसवा  तिला हात धरून. कुणीतरी पाणी आणा रे लवकर. “

खाली बसायच्या ऐवजी बिल्वाने तर डोळेच मिटून घेतले. होते. आणि भाऊजींचा चेहरा अगदी फोटो काढण्यासारखा झालेला होता.

हा काय प्रकार आहे बाई । कुणाला काहींच कळेना, आणि ते दोघे तर जागचेही हलेनात. अखेर भाऊजींच्या खट्याळ मेव्हणीच्या लक्षांत सारा प्रकार आला. पुढे होऊन जिजाजींच्या शर्टच्या बटणामधून सौ. ताईची नाजुक केसांची बट तिनें नाजुकपणे सोडवली आणि म्हणाली. ” जिजाजी, पुढच्या मंगळागौरीला बटणांऐवजी हुक असलेला शर्ट घाला, म्हणजे सगळ्यांसमोर नेहमी नेहमी असा सिनेमा घडायला नको. ” 

सगळे गडगडाटी हसले. नुसता टाळ्यांचा, हास्याचा धबधबाच जणू काही कोसळला. आणि बिल्वा !! ती तर गालावर गुलाब फुलवून केव्हाच आत पळाली होती.

…. तर मंडळी अशी फुलली ही आमच्या घरातील बिल्वा-भाऊजींची पहिली वहिली मंगळागौर.

© सौ. सौ. राधिका गोपीनाथ (माजगांवकर) पंडित

पुणे

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ताक… लेखक – श्री पराग गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

ताक… लेखक – श्री पराग गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

का कोणास ठाऊक, पण दुधाने तोंड पोळल्यामुळे ताकाची उगाचच बदनामी झालीये. पोळणारं दूध आणि समंजस ताक यांच्यात तसंही फक्त एक रंग सोडला तर बाकी काहीही साम्य नाही. ताकाचं पालकत्व तर दुधाकडेच, पण जन्मदाता आणि  हे अपत्य यांच्यात किती तो फरक!! जसा सूर्य आणि चंद्रात फरक.

दुधाची साय, सायीचं दही, ते घुसळून मग वर जमा होणारं लोणी आणि मग ती सगळी स्निग्धता काढून घेतल्यावर उरतं ते परमप्रिय ताक. त्याचं दुसरं नाव अमृत आहे म्हणे… मला आवडतं ताक. उगाच ताकाला जाऊन भांडं लपविण्यात काय हशिल? जेवण झाल्यावर आमटीच्या वाटीत घेतलेलं ताक म्हणजे निव्वळ नशा. थोडीशी आमटीची चव आणि थोडी ताकाची. भरपेट जेवणावर खात्रीचा उतारा. पचण्यासाठी.

पूर्वी जेवणाचा शेवट ताकभातानेच  व्हायचा. मला आठवतंय, माझा एक मामा मागचा भात घेतल्यावर त्यात ताकासाठी आळं करायचा, ताक वाढणारा/वाढणारी  आल्यावर आधी ओंजळ पुढे करून ताकाचा भुरका मारायचा, सणसणीत आवाज करत आणि मगच भातावर ताक घेऊन तो कालवायचा. कोण काय म्हणेल असा विचारही त्याला नाही शिवायचा. आज जरी तो  नसला, पण ताकभात खाताना त्याच्या भुरक्याची मात्र हमखास आठवण होते. असा भात जेवताना इतस्ततः पळणारं ताक निपटताना त्याची कोण तारांबळ उडायची तरीही तो ताकभात त्याच पद्धतीने जेवायचा.

ताकावर वेगवेगळ्या प्रकारचे साज चढवले की त्याची खुमारी प्रचंड वाढते आणि ते चढवण्यात आपल्या गृहिणींचा हातखंडा असतो. वादातीत.

आंबट ताकाला डाळीचं पीठ, मिरच्या, कोथिंबीर, जिरं, हिंग, हळद, लसूण  इत्यादी लेण्यांनी मढवले की त्याची कढी तयार होते. या कढीत गोळे घातले की तयार होणारं अफलातून रसायन म्हणजे क्या बात. थोडासा फडफडीत भात, सोबत लोणच्याची फोड आणि कढी हे ज्यानं अनुभवलंय तोच त्याची महती जाणो.

हेच ताक वापरून होते उकड. उकड म्हणजे एक वेगळंच प्रकरण. कोकणातला एक साधासा पण अप्रतिम पदार्थ. बोटांनी चाटूनपुसून खाऊन फस्त करावा असा. एक विशेष आणि खास न्याहारी. कितीही खाल्ली तरी कंटाळा न येणारी. ती चाखुनच तिचा अनुभव घ्यावी अशी. हेच  वापरून केलेली पालकाची ताकातली भाजी, डाळ किंवा शेंगदाणे घालून म्हणजे आणखी एक भारीतली चीज. ही सगळी व्यंजनं म्हणजे सुगरणीचा आत्मा आणि खाणाऱ्याचा खात्मा, निःसंशय !!!

पण ताकाचं एक सगळ्यात खास द्रावण म्हणजे मठ्ठा. लग्नात  जेंव्हा पंक्ती उठायच्या तेंव्हा मठ्ठा पंक्तीचा समारोप करायचा. ताक, मिरच्या कोथिंबीर, जिरं, थोडीशी साखर असं लावून तयार झालेला मठ्ठा म्हणजे मठ्ठा. त्याला कशाची उपमा द्यायची? जिलबी त्यात बुडवून ठेवायची आणि मग ती हलकेच तोंडात सोडायची.

मठ्ठा आणि जिलबी ही जोडगोळी म्हणजे मातब्बर जुगलबंदी. अगदी तोडीस तोड. जिलब्यांची रास संपवून वर वाटीभर पाक पिणारे बहाद्दर पण मी याची देही याची डोळा पाहिलेले आहेत. त्यांना नव्हती मधुमेह, cholesterol वगैरे राक्षसांची दहशत? का अज्ञानात सुख होतं? का  देवाक् काळजी म्हणत लढणारे लढवय्ये होते ते? त्यांनाच विचारायला हवं होतं.

नुसतं मीठ घालून ताक, जिऱ्याची पूड किंवा हिंग लावलेलं ताक, चाट मसाला घातलेलं ताक, सगळेच प्रकार निव्वळ अप्रतिम. तहानलेलं असताना पंचवीस रुपयांचं कोला नामक विष पिण्यापेक्षा ताक नामक अमृताला मी नेहमीच पसंती देत आलोय आणि आयुष्यभर देत राहीन हे नक्की.

हल्ली बरेच  पॅकबंद  ताकाचे प्रकार उपलब्ध आहेत बाजारात पण ते अडीनडीला ठीक. आईनं केलेलं, रवीनं घुसळलेलं, जीव ओतलेलं आणि लोण्याचा गोळा काढून पाण्यात सोडल्यानंतरचं ताक म्हणजे खरंखुरं ताक. त्याची कशाशीच तुलना नाही ही मात्र काळ्या दगडावरची रेघ, कधीच न पुसली जाणारी.

ता. क: बायकोला ताकास तूर लागू न देता हे लिहितोय, नाहीतर आईची स्तुती केली म्हणून माझी ताकाची रसद बंद व्हायची…

लेखक : पराग गोडबोले

मो. ९३२३२ ७७६२०

प्रस्तुती : अमोल केळकर 

#माझी_टवाळखोरी 📝

poetrymazi.blogspot.in,

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

kelkaramol.blogspot.com 

a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आश्वस्त प्रेम… ☆ सुश्री सुनीता पाटणकर☆

सौ. सुनीता पाटणकर

? मनमंजुषेतून ?

☆ आश्वस्त प्रेम… ☆ सुश्री सुनीता पाटणकर ☆

सकाळी घरातलं आटपून कामावर निघाली आणि तिच्या चप्पलचा अंगठा तुटला. बाहेर पावसाची रीपरीप चालूच होती. खड्ड्यातल्या रस्त्यातून, चिखलातून चालत कामाच्या ठिकाणी पोहोचायचं, म्हणजे एक कसरतच !! 

आज थोडा उशीर झालेला, म्हणून ती चप्पल सोडून अनवाणीच झपाझपा चालत सुटली. कामावर तिच्या दोन मैत्रीणी आजारी आणि दोघी घरच्या शेतात भाताची पेरणी या कारणांनी गैरहजर. मग आज आपण वेळेत जायलाच हवं, ही ओढ ! बेफिकिरीने वागू शकली असती, पण स्वभावात ती नव्हती. कामावरची मालकीण खूप चांगली, प्रेमाने, आपुलकीने वागणारी, रागावली तरी तितकीच समजून घेणारी. तिलाही वाटायचं एरवी कधीतरी चालेलं, पण आज कामही खूप आहे, आपण पाच सहा जणीचं आहोत, तर वेळेवर पोहोचायलाच पाहिजे. असा विचार घोळवतचं कामावर येऊन कामाला लागली.

दोन तासांनी तिचे यजमान आले. काय झालं? अचानक का आले?तिलाही घरी न्यायला आले की काय? काय घडलं असेलं?नाना शंका मनात घेऊन, मालकीण सहजचं दरवाज्या जवळ गेली.

ती म्हणत होती, “तुम्ही कशाला घेऊन आलात?”ते म्हणाले, “अग! तुझ्या पाठोपाठ मी बी कामावर निघालो, बगीतलं तर तुज्या चपला दारात पडल्येल्या. पायलं तर अंगठा तुटल्याला. जीव कळवळला माजा. मंग अंगठा शिवून घ्यून आलो. “

हे प्रेम, वात्सल्य, कळवळा, समज बघून डोळे पाणावले.

© सौ. सुनीता पाटणकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वातंत्र्य दिन 🇮🇳 ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

??

स्वातंत्र्य दिन 🇮🇳 ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

(१५.०८.२०२४)

आज भारताचा ७८वा स्वातंत्र्य दिवस. 🇮🇳

मागील ७८ वर्षात भारताने लक्षणीय प्रगती केलेली आहे. त्याबद्दल सर्व भारतीयांचे कौतुक करावे तितके थोडे आहे.

शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यात राहूनही काही वर्षात अशी नेत्रदीपक प्रगती करणे हा पराक्रम म्हणावा लागेल….!

अनेक क्षेत्रातील प्रगतीची उंच शिखरे गाठत असताना, आपण माणुसकीच्या शिखरावरून खाली तर येत नाही ना याचाही विचार केला पाहिजे.

आर्य सनातन वैदिक हिंदू संस्कृतीने मागील हजारो वर्षात कोणावरही आक्रमण केले नाही, तर याउलट सर्व विचारधारांना आपल्या मध्ये सामावत माणुसकी धर्म वाढवण्याचा प्रयत्न केला.

*भगवंताने गीतेत सांगितलेला उपदेश प्रत्यक्ष आचरणात/कृतीत आणण्याचा कालावधी सुरू झाला आहे असे म्हणता येईल. देशातंर्गत सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आपल्याला आढळून येईल. भागवतांनी सांगितलेली गीता अर्जुनाने नुसती पाठ केली नाही, तर ती समजून घेऊन अधर्मी लोकांचा नाश केला. हा इतिहास आपण आजच्या पावन दिनी आठवूया.

अर्जुनाने शमी वृक्षावर ठेवलेली शस्त्रे काढून युद्ध केले. आज आमच्या घरात उंदीर मारायला काठी असेल असे सांगता येत नाही. आपल्या सर्व देवी देवतांच्या हातात शस्त्र आहे आणि ते चालवण्याची धमक आणि कुशलता देखील आहे. आपण याचे अनुकरण आणि अनुसरण करण्याची गरज आहे.

अधर्माचा नाश आणि धर्माची प्रतिष्ठापणा करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. भारत विश्विजेतेपदी विराजमान होण्यासाठी दुर्जन सक्रिय आणि सज्जन निष्क्रिय हे समीकरण उलट करावे लागेल.

यासाठी आरक्षणाची नाही तर स्वतः देशाचे, धर्माचे संरक्षण करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

आजच्या पावनदिनी आपण अशी प्रतिज्ञा करू की भारतमातेच्या डोळ्यांत अश्रू येणार नाहीत, यापुढे माझी भारतमाता कधीही खंडीत होणार नाही…!!

“मोठा झालो तरी देखील

मी तुला विसरणार नाही

दे म्हटले तरी देखील

तुला अंतर देणार नाही

तू सुखी तर आम्ही सुखी

तुला सारे कळते आई

तुझ्या डोळ्यांत अश्रू येतील

असे कधी होणार नाही.”

भारत माता की जय!! 🇮🇳

आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय!!!💐

*

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares