मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शिखा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? मनमंजुषेतून ?

☆ शिखा ! 😅 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“शिखा” ह्या शब्दाचा अर्थ साधारण माझ्या पिढीतील, सत्तरी क्रॉस केलेल्या लोकांना माहित असण्याचा संभव जास्त.  हल्लीच्या तरुण पिढीला “शिखा” ऐवजी “शाखा” हा शब्द जास्त जवळचा व कानावरून जात असलेला.  मग ती “शाखा” सकाळी, सकाळी एखाद्या मैदानात, शाळेच्या पटांगणात भरणारी असो, अथवा एखाद्या राजकीय पक्षाचे वेगवेगळ्या विभागातील ऑफिस. पण तेच जर का आपण “शिखा” ऐवजी “शेंडी” म्हटले, तर शंभरपैकी नव्याणव तरुण, तरुणींना ते लगेच कळेल आणि मग त्यांच्या तोंडातून आश्चर्याने “ओह आय सी, शिखा म्हणजे शेंडी काय!” असे शब्द बाहेर पडल्या शिवाय राहणार नाहीत ! 

आपल्या लहानपणी आपले आई बाबा, आजी-आजोबा आपण काही कारणाने जेवत नसलो तर, “माकडा माकडा हूप, तुझ्या शेंडीला (खरं तर शेपटीला) शेरभर तूप” असं काहीतरी बोलून आपल्याला भरवत असत.  तेंव्हा आपल्या बालबुद्धीला, माकडाला शेंडी कुठे असते, असं विचारणं कधी सुचलं नाही ! पण त्या ओळी गाऊन आपल्याला बळे बळे जेवायला लावणारे आपले आई – बाबा किंवा आजी-आजोबा यांनी आपल्याला तेंव्हा एक प्रकारे शेंडीच लावलेली असते, हे आपल्याला आपण मोठे झाल्यावरच कळते ! त्यामुळे मोठेपणी आपण सुद्धा दुसऱ्या कोणालातरी कधीतरी शेंडी लावण्याचे संस्कार आपल्याला त्यांच्याकडूनच मिळालेले असतात, असं जर मी या ठिकाणी म्हटलं तर, मी आपल्याला शेंडी लावतोय असं वाटण्याच काहीच कारण नाही ! असो !

आजही मुलाची मुंज करताना, साधारण एप्रिल-मे मधला मुहूर्त धरला जातो. कारण नंतर शाळेला सुट्टी असल्यामुळे त्या सुट्टीत बटूचे केस वाढून, त्याला शाळेत “ऑकवर्ड फिल” होऊ नये हा एक विचार त्याच्या मम्मी पप्पांच्या मनांत असतो.  शेंडी व्यतिरिक्त तिच्या भोवती थोडे बारीक केस ठेवण्याची पद्धत आहे, ज्याला घेरा असे म्हणतात.

शेंडी ठेवण्या मागे काही वैज्ञानिक कारणे पण आहेत, असं जर मी या ठिकाणी सांगितलं तर पुन्हा मी आपल्याला शेंडी लावतोय असं वाटण्याचा संभव आहे, पण आपण गुगल करून (ज्याला बहुतेक शेंडी असावी) मी जे आता सांगणार आहे त्याच्या सत्य असत्याचा नक्कीच शोध घेऊ शकता. तर डोक्यावर ज्या ठिकाणी शेंडी असते तिथेच सार्‍या शरीराच्या नाड्या एकत्रित होतात असं आधुनिक विज्ञान सांगत. इतकंच कशाला, या ठिकाणाहूनच मनुष्याची ज्ञानशक्ती निर्माण होते.  तसेच शेंडी सार्‍या इंद्रियांना स्वस्थ ठेवते व कोणाही व्यक्तीचं क्रोधावर नियंत्रण राहतं आणि विचार करण्याची त्याची क्षमतादेखील वाढते !

हिंदू धर्मात ऋषी मुनी डोक्यावर शेंडी ठेवायचे. गुरुगृही “अध्ययन” करतांना पूर्वी शिष्याच्या शेंडीला दोरी बांधून ती खुंटीला बांधत असत. जेणेकरून जर “अध्ययन” करतांना त्याला झोप लागली, तर शेंडीला हिसका बसून त्याला जाग यावी, हा हेतू ! याच अनुषंगाने इतिहासात होऊन गेलेले प्रकांड पंडित आर्य चाणक्य, यांच्या बुद्धिमत्तेचा आणि त्यांच्या डोक्यावर असलेल्या घेरा व शेंडीचा सुद्धा काही संबंध असू शकतो का, असं मग कधी कधी मला वाटायला लागत. 

आपण साऱ्यांनी विदेशी लोकांचे अंधानुकरण करून, आपल्या पूर्वापार चालत आलेल्या काही गोष्टींचा त्याग केला, त्यातली एक गोष्ट म्हणजे शेंडी ! पण आता त्याच विदेशी लोकांना शेंडीचे वैज्ञानिक महत्व कळल्यामुळे “हरेराम हरेकृष्ण” हा पंथ आचरणारे सारे पुरुष अनुयायी लांब लचक शेंडी बाळगून असल्याचे पहायला मिळत ! 

आपल्याकडे पौरोहित्य करणारे काही ब्राम्हण अजूनही  शेंडी बाळगून आहेत, आता त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असावी इतकेच ! पण दाक्षिणात्य पुरोहित, जे माझ्या पाहण्यात आलेत, ते सगळे डोक्यास घेरा व त्या मधे शेंडी बाळगून असतातच असतात !

तसेच अजूनही पानपट्टीचा ठेला चालवणारे काही पुरभय्ये लांब लचक शेंडी बाळगून वर त्याला छोटी गाठ बांधून, कपाळी लाल, पिवळे गंध लावून आपल्या पानाच्या ठेल्यावर बसल्याचे दिसतात ! असे पानाचे ठेले आणि ते पुरभय्ये काळाच्या ओघात आता नष्ट झाले आहेत, हे आपण सुद्धा मान्य कराल.

फार पूर्वी एखाद्या राजाने शिक्षा म्हणून शेंडी कापण्याची आज्ञा दिल्याचे इतिहासात दाखले सापडतात. पण त्या काळी अशी शिक्षा, देह दंडाहून कठोर समजली जायची, असा तो काळ होता आणि तेवढंच आपापल्या शेंडीला लोक महत्व देत होते !

आपल्या मराठी भाषेत शेंडी शब्दाचा उपयोग अनेक म्हणी अथवा वाक्प्रचारात केलेला आढळतो. तुम्हांला कोणी फसवलं तर लगेच तुम्ही, “तो मला शेंडी लावून गेला” असं म्हणता ! एखादी गोष्ट आपण या पुढे कधीच करणार नाही, यासाठी आपण “आता शेंडीला गाठ” असं शेंडी नसली तरी,  बिनदिक्कत म्हणतोच ना ! तसंच वेळ पडल्यास आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल, तर “शेंडी तुटो अथवा पारंबी” या म्हणीचा वापर शेंडी नसली तरी करण्यास आपण मागे पुढे पहात नाही !

शेवटी, शेंडी ठेवावी का ठेवू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण शेंडी कोणी कोणालाच लावू नये यावर सगळ्यांचे मतैक्य होण्यास शेंडी नसली तरी काहीच अडचण नसावी !

शुभं भवतु !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – ६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टूडे)

जयवंतीण”

काही शब्दांचा अर्थ बालवयात कळत नसेल पण असे काही संबोधनात्मक शब्द मनाच्या आत कुठेतरी नक्कीच गुदमरणारा तीव्र गोंधळ घालायचे. त्यापैकी दोन शब्द मला चांगलेच आठवतात. “वांझोटी आणि प्रौढ कुमारिका”

शब्दांसारखे शब्द पण ते उच्चारताच अर्थापेक्षा त्यामागचा उपहास, तुच्छता, भोचकपणा, भावनाहीन चेष्टा मात्र मला जाणवायची आणि मी विचारात पडायची. भाषेतला, उच्चारातला, भावनेतला गोडवा अजिबात न जपणारे हे शब्द आहेत आणि अशा शब्दांची वाणीतून, मनातून हकालपट्टी झाली पाहिजे असे मला माझ्या आतील प्रवाहातून त्यावेळी वाटायचे.

एखाद्या बाईला मूल नसणं अथवा तिची मुलं जन्मत:च मृत असणं याबाबत समाजाची होणारी प्रतिक्रिया किती ओंगळ असू शकते हे मी त्या न कळत्या वयात नकळत अनुभवलं.

आमच्या घरासमोर एक चाळवजा इमारत होती. ती इमारत कोणाच्या मालकीची होती ते मला आठवतं नाही. एक खणी लहानलहान घरं असलेली ती इमारत होती. तिथे जयवंत नावाचं एक दांपत्य रहात होतं. गल्लीतले सगळे त्यांना जयवंत आणि जयवंतीण असेच संबोधत. वास्तविक हे असं दांपत्य होतं की जे गल्लीत कोणात फारसं मिसळतच नसे. सगळ्यांपासून अलिप्तच होतं म्हणाना !

सकाळी ठराविक वेळेला जयवंत शर्टाच्या पाठीमागच्या कॉलरला, पावसाळा नसला तरीही लांबलचक छत्री अडकवून कामावर जायला निघायचे. ते कुठे आणि काय काम करत होते हे माहीत नव्हतं. अगदी संपूर्ण मळेपर्यंत एकच शर्ट आणि विजार त्यांच्या अंगावर आठवडाभर असायची. जयवंतीण दिसायला खरोखरच सुरेख होती. गोरीपान, नाकीडोळी नीटस पण अत्यंत गबाळी ! सदैव केस विस्कटलेले, साडी अंगावर कशीबशी गुंडाळलेली, चेहऱ्यावर उदास चैतन्यहीनता, बोलण्यात हसण्यात कशातच जीव नसल्यासारखा. सगळेजण तिला “मळकट पांढरी पाल” म्हणायचे. कोपऱ्यावरच्या घरातल्या मीना मथुरेची आई दिवसभर पायरीवर बसून कोण आलं, कोण गेलं यांच्या नोंदी ठेवायची. कुठे कशासाठी कोण चाललं आहे घराबाहेर याचीही ती अत्यंत कर्तव्य बुद्धीने चौकशी करायची पण जयवंतीण दिसली की पटकन घरात जायची आणि “वांझोटी” म्हणत जोरात दरवाजा लावून घ्यायची.

जयवंतीणबाईला मूल नव्हतं कारण तिचं जन्माला येणारं प्रत्येक मूल हे मृतावस्थेतच जन्म घ्यायचं. जयवंतीण बाईचं मातृत्व हे जन्म आणि मृत्यूच्या रेषेवर विद्रुपावस्थेत टांगलेलं राहिलं. मात्र एक होतं की तिच्या प्रत्येक बाळंतपणाच्या वेळी गल्लीतला तिच्याविषयी असणारा एक उपहासात्मक प्रवाह मात्र काहीसा स्तब्ध असायचा. “या खेपेस तरी या बाईचं मूल जगू दे !” अशी भावना सगळ्यांच्या मनात असायची. प्रत्येक वेळी एक ताण, एक दडपण, एक अत्यंत अप्रसन्न शांतता गल्लीने जाणवलेली आहे. घरीच एक सुईण यायची. दार बंद असायचं आणि हे बंद दार जेव्हा उघडायचं तेव्हा जयवंतच्या हातात फडक्यात गुंडाळलेला एक ओला रक्तामासाचा बरबटलेला मृत गोळा असायचा आणि ते एकटेच त्या गोळ्याला मातीत पुरवून टाकायला निघालेले असत. ना कुणी नातेवाईक ना कोणी मित्र. माणूसकी म्हणून गल्लीतलेच न सांगता कुणी त्यांच्याबरोबर जात असत आणि घरात अत्यंत कळाहीन अवस्थेत जयवंतीण बाई चा आक्रोश चालायाचा. माझी आजी ब्रांडीची बाटली घेऊन तिच्या घरात जायची, तिच्या हातापायांना त्याही अवस्थेत चोळत राहायची तिच्या पांढऱ्या फट्टक चेहऱ्यावर मायेने गोंजारून तिचं डोंगराएवढं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करायची. कुणाच्या दुःखाला कसं मायेनं गोंजारावं हा संस्कार आजीच्या या लहानशा कृतीतून नकळतच रुजला.

अशाच एका असफल बाळंतपणातच जयवंत बाईचा शेवट झाला आणि गल्लीतला दरवर्षी घडणारा दुःखद अध्याय कायमचा संपला. जयवंत नंतर कुठे गेले, त्यांचं काय झालं याची खबरबात गल्लीने कधीच घेतली नाही. एका अंधाऱ्या, चैतन्यहीन, बोडक्या, एक खणी घराला कायमचं एक कुलूप लागलं.

या घटनेच्या अशा धूसर रेषा माझ्या स्मरणात आजही आहेत. हे अत्यंत वेदनादायी दृश्य काळाबरोबर वाहून गेलंही असेल पण त्या दृश्याचे मनावर झालेले परिणाम कधीकधी वेगळ्या स्वरूपात आजही जाणवतात. जगताना माणसाच्या जाणिवा जेव्हा प्रगल्भ होतात ना तेव्हा मनावर उमटलेले हे पुसट ठसे पुन्हा पुन्हा दृश्यरूप होतात.

आता माझ्या मनात विचार येतो जयवंतीणबाई वांझोटी कशी ? ती जन्मदा तर होतीच ना ? दुर्दैवाने तिची कूस भरली नाही त्यात तिचा काय दोष ? त्यावेळी विज्ञान इतकं प्रगत नव्हतं का की समाजाचं प्रबोधन कमी पडलं? जयवंतीणबाई बरोबर जे घडत होतं त्याभोवती अंधश्रद्धेचे विचार प्रवाह ही वेढा घालून असावेत. विज्ञानाचे कुंपण तिथे नव्हतं. डीएनए, क्रोमोझोम्स, निगेटिव्ह रक्तगटांचे ज्ञान नव्हतं किंवा अशा प्रगत विचारांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजाने पायऱ्याच बांधल्या नव्हत्या का ? अशावेळी जयवंतीणबाई माझ्या नजरेसमोर प्रातिनिधिक स्वरूपात उभी राहते. आज व्यंधत्वावर मात करणारी प्रचंड प्रगत वैज्ञानिक तंत्रे उपलब्ध आहेत. ज्ञान आणि जागरूकता यांची सांगड सकारात्मक दृष्टिकोनातून घातली जात आहे. थोडं विषयांतर करून मला इथे हेही नमूद करावसं वाटतं की माझ्या परिचयातल्या, नात्यातल्या, माझ्या काही मैत्रिणींनी मूल न झाल्याचं दुःख न बाळगता अनाथ मुलांचं मातृत्व आनंदाने स्वीकारलेलं आहे. आयुष्यातल्या उणिवा भरून काढताना एक उदार समाजदृष्टिकोनही त्यांनी जपला आहे. मला त्यांचा अत्यंत अभिमान वाटतो आणि आज अशा भावना निर्माण होण्यामागे किंवा अशी मानसिकता तयार होण्यामागे न कळत्या वयात न समजलेलं जयवंतीणबाईचं दुःख कुठेतरी अजूनही ओलं आहे असं वाटतं आणि पुन्हा यातना होतात जेव्हा आजही कधी “वांझोटी” हा शब्द कानावर पडला तर.

एकाच वेळी समाज सुधारलाय असे म्हणताना भाषेतून अशा गलिच्छ उपहासात्मक, दुसर्‍याच्या भावनांची बूज न राखणार्‍या शब्दांची कायम स्वरूपात हकालपट्टी का होत नाही याचाही खेद वाटतो. आणखी एक अपराधीपणाचा सल आहे.

का कोणीच जयवंतीणबाईच्या दुःखापर्यंत पोहोचू शकले नाही ? आम्ही गल्लीतली मुले तिला जयवंतीणबाई असेच म्हणायचो. आमच्यापैकी एकाने तरी तिला जयवंत आई किंवा जयवंताई म्हणून हाक मारली असती तर ..कदाचित त्या कोमेजल्या रोपाची पाण्यासाठीची तहान किंचित तरी भागली असती का ? आज तो सल आहे— आम्ही हे का केलं नाहीv?

क्रमशः भाग सहावा. 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “घर थकलेले संन्यासी…” – लेखक : प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

??

☆ “घर थकलेले संन्यासी…” – लेखक : प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

घर थकलेले संन्यासी

हळूहळू भिंतही खचते ….

नागपुरातल्या प्रताप नगर, रविंद्र नगर, टेलिकाॅम नगर परिसरातून रोज जाणेयेणे करताना ग्रेसच्या या ओळी मनात येतात. नागपूर म्हणजे तसे ऐसपैस अघळपघळ शहर होते. ४० – ५० वर्षांपूर्वी तत्कालीन नोकरदारांनी थोडे शहराच्या बाहेर मोकळ्या हवेत घर बांधूयात म्हणत दक्षिण, नैऋत्य नागपुरात मौजा जयताळा, मौजा#e-abhivyakti भामटी, मौजा परसोडी शिवारात प्रशस्त प्लाॅटस घेतलेत. त्यावर खूप नियोजन करून सुंदर टुमदार घरे बांधलीत. त्यात आपल्या कुटुंबाचा, मुला नातवंडांचा विचार करून छान ३००० ते ५००० चौरस फुटी प्लाॅटसवर प्रशस्त वास्तू उभारल्यात. तळमजला आणि पहिला मजला.

त्या प्लाॅटसवर तेव्हाच्या मालकांनी छान छान झाडे लावलीत. जांभूळ., पेरू,आंब्यासारखी फळझाडे, पारिजातक, सदाफुली, चाफ्यासारखी फुलझाडे, मोगरा, मधुमालती, गुलमोहराचे वेल. आपण लावलेले आंब्याचे झाड आपल्या नातवाला फळे देईल, फुलझाडांची फुले रोज देवपूजेला कामाला येतील, मोकळी हवा मिळेल, मस्त जगू हे साधे सोपे, कुणालाही न दुखावणारे स्वप्न.

सुरूवातीच्या काळात मुख्य शहराबाहेर वाटणारी आणि “कुठच्याकुठे रहायला गेलात हो !” अशी पृच्छा सगळ्यांकडून होणारी ही वस्ती शहर वाढल्याने अगदी शहराचा भाग झाली. सगळ्या सोयीसुविधा इथे मुख्य शहरासारख्याच किंबहुना त्यापेक्षा वरचढ उपलब्ध होऊ लागल्यात. घरमालक सुखावलेत. तोपर्यंत ते त्यांच्या निवृत्तीच्या आसपास पोहोचले होते. मुले हाताशी आलेली होती. मुलींची लग्ने झालेली होती, ठरलेली होती. सगळं छान चित्र.

पण १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात आलेल्या संगणक क्रांतीने जग बदलून गेले मग नागपूर तरी त्याला कसे अपवाद असणार ? संगणक क्रांती नागपूरच्या आधी पुणे, हैद्राबाद, बंगलोर ला आली. होतकरू, हुशार तरूणांचे नोकरीनिमित्त फार मोठे स्थलांतर सुरू झाले. काही काहींचे तर अगदी सातासमुद्रापार अमेरिकेत स्थलांतर झाले. 

सुरूवातीला “माझा मुलगा बे एरियात आहे, डाॅलर्समध्ये कमावतोय. गेल्या वर्षी आम्ही दोघेही जाऊन आलो अमेरिकेत. म्हातारा म्हातारीला मुला – सुनेने पूर्ण अमेरिका दाखवून आणली हो. अगदी लास वेगासला नेऊन कॅसिनोत कधी नव्हेतो जुगारही खेळलो.” असे कौतुक झाले.

पण नंतर अमेरिकेत गेलेले, पुणे बंगलोरला गेलेले मुलगा – सून नागपूरला परतण्याची चिन्हे दिसेनात. तिथली प्रगती, तिथल्या संधी इथे नव्हत्या. नातवंडांचा जन्म जरी नागपुरात झाला असला तरी त्यांची वाढ, शाळा या सगळ्या घाईगर्दीच्या महानगरांमध्ये झाल्याने त्यांना नागपूर हे संथ शहर वाटू लागले. इथे फक्त आपले आजी – आजोबा राहतात, हे आपले शहर नाही हे त्यांच्या मनात बिंबले गेले. त्यात त्यांचाही काही दोष नव्हता. करियरला संधी, उभारी मिळणारी ठिकाणे कुणालाही आपलीशी वाटणारच. घरमालक आजी आजोबा नागपूरला अगदी एकटे पडलेत. तरूणपणी एकत्र कुटुंबात वाढावे लागल्याने राजाराणीच्या संसारासाठी आसुसलेल्या या पिढीला आता हा राजाराणीचा संसार अक्षरशः बोचू लागला. भरलेले, हसते खेळते असावे म्हणून बांधलेले घर आता फक्त झोपाळ्याच्या करकरणार्‍या कड्यांच्या आवाजात आणि संध्याकाळी मावळत्या सूर्यासोबत अंगणातल्या झाडांच्या लांब सावल्यांमध्ये बुडून जायला लागले. मुला – नातवंडांच्या संसाराची वाढ लक्षात घेऊन बांधलेले चांगले ८०० – ८५० फुटांचे प्रशस्त स्वयंपाकघर सकाळी साध्या भातासोबत फोडणीचे वरण आणि संध्याकाळी त्याच उरलेल्या भाताला फोडणी दिलेली बघू लागली. स्वयंपाकघरातल्या ताटाळात असलेल्या ३० – ४० ताटांवर धूळ जमू लागली. सकाळ संध्याकाळ एक कुकर, दोनतीन भांडी, एक कढई आणि दोन ताटल्या एवढ्यातच भांड्यांचा संसार आटोपू लागला.

मालकांची मुलेही पुण्यात, बंगलोरला स्थाइक झालीत. ही दुसरी पिढीही आता निवृत्तीच्या आसपास आली होती. त्यांची मुलेही तिथेच रमली होती, पोटापाण्याच्या उद्योगाला लागली होती. नागपूरच्या त्यांच्या फेर्‍या वर्षातून सणांसाठी एकदोन वेळा किंवा ते ही जमेनासे झाले तर म्हातारा – म्हातारीला पुणे बंगलोरला बोलावून तिथेच महालक्ष्म्या गणपती हे सण साजरे होऊ लागलेत. “आमच्या घरच्या महालक्ष्म्या या वर्षी म्हैसूरला बसल्या होत्या हं” हे अभिमानाने सांगण्यातल्या सुरांत “कधीकाळी महालक्ष्म्यांसाठी लागतील म्हणून खूप फुलझाडे, केळीच्या पानांसाठी केळी नागपूरच्या घरात लावलेली होती त्यांचा या वर्षी उपयोगच झाला नाही. सगळी तशीच सुकून गेलीत.” हा सूर मनातल्या मनातच खंतावू लागला.

म्हातारा – म्हातारी आजारी पडू लागलेत. हाॅस्पिटलायझेशन साठी मुले येऊ लागलीत. ती पिढी तर यांच्यापेक्षा जास्त थकलेली. “बाबा / आई, तुम्ही तिकडेच चला ना आमच्यासोबत. सगळ्यांनाच सोईचे होईल.” असा व्यावहारिक मार्ग निघू लागला. म्हातारा – म्हातारी सहा महिने, वर्ष आपल्या वास्तूपासून, जीवनस्वप्नापासून दूर राहू लागलेत.

जीवनक्रमात अपरिहार्य म्हणून दोघांपैकी एक देवाघरी गेल्यावर तर राहिलेल्या एकट्यांचे जिणे अधिकच बिकट होऊ लागले. छोटीछोटी दुखणीखुपणी, अपघात अगदीच असह्य होऊ लागले. नागपुरात रूजलेले, वाढलेले हे वृक्ष   आपल्या मुळांपासून तुटून दूरवर कुठेतरी रूजण्यासाठी नेल्या जाऊ लागलेत. नाईलाज असला तरी ही मंडळी मुला नातवंडांमध्ये रमू लागलीत. नागपुरातली घरे मात्र यांच्या जाण्याने यांच्यापेक्षा जास्त थकलीत.

अशा विस्तीर्ण प्लाॅटसवर आणि मोक्याच्या जागांवर बिल्डरांचे लक्ष गेले नसते तरच नवल. एवढ्या मोठ्या प्लाॅटवर फक्त २ माणसे राहतात ही बाब त्यांच्या व्यावसायिक दृष्टीकोनाला पटण्यासारखी नव्हती. अशा टुमदार घरांचे करोडोंचे व्यवहार होऊ लागलेत. त्याजागी ५ – ६ मजली लक्झरीयस फ्लॅटस बांधले जाऊ लागलेत. थकलेली घरे जमीनदोस्त झालीत. सोबतच घर मालक मालकिणींची स्वप्नेही नव्या फ्लॅटस्कीमच्या खोल पायव्यात गाडली जाऊ लागलीत. एक दीड कोटी रूपये मिळालेत तरी ते घर, त्याच्याशी निगडीत स्वप्ने, त्याचा टुमदारपणा, ऐसपैसपणा याची किंमत कितीही कोटी रूपयांमध्ये होऊ शकत नाही ही जाणीव आयुष्याच्या संध्याकाळी काळीज पोखरत राहिली.

थकलेल्या संन्यासी घराची भिंत अशीच हळूहळू खचत राहिली.

लेखक : प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

प्रस्तुती : मोहन निमोणकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मोठं काम म्हणजे काय?” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “मोठं काम म्हणजे काय?” ☆ सुश्री शीला पतकी 

संस्थेत कामाला जाण्यासाठी मी घरातून निघाले साधारणपणे साडेबारा एक ची वेळ होती मी गेटच्या बाहेर आले तर आमचे सर भेटले.मी म्हणाले  सर कुणीकडे चालला आहात?… ते म्हणाले, शनी देवळाकडे… मी म्हटलं चला मी सोडते तुम्हाला… आणि मग रिक्षा केली माझ्या शेजारी बसलेले माझे शिक्षक हे माझे पूर्वीचे मुख्याध्यापक ज्यांच्या नावाने मी तो ट्रस्ट चालवते ते श्री  तडवळकर सर होते. मग रिक्षात बसून मी संस्थेत झालेल्या ऍडमिशन्स ..असलेले शिक्षक.. इंग्रजी माध्यमाचे प्रवेश बंद झालेले तुडुंब भरलेले वर्ग… याबद्दल मी सर्वांना माहिती देत होते  मी विस्तृत पणे काय योजना केली आहे ते विचारत होते हे …सर्व बोलणे समोरचा रिक्षावाला मुलगा छान पद्धतीने ऐकत होता. सरांना मी दत्त चौकात सोडलं आणि मी संस्थेत येण्यासाठी निघाले. 

त्यावेळेला रिक्षावाल्या पोराने विचारलं ,बाई तुम्ही शाळेत शिकवता का?.. मी म्हणाले हो. मी शिक्षिका आहे…. मी त्याला विचारलं तू किती शिकला आहेस? . तो म्हणाला मी बारावी पास आहे. तो मुस्लिम समाजाचा होता तो म्हणाला आमच्याकडे जास्त शिकत नाहीत लगेच कामधंद्याला लावतात त्यामुळे पुढे इच्छा असून मी शिकू शकलो नाही. कारण घरात माणसं खूप आहेत प्रत्येकाला कमवावाच लागतं. मग मी नापास मुलांवर करीत असलेल्या कामाची त्याला माहिती दिली त्याला त्यामध्ये खूपच इंटरेस्ट आहे असे मला लक्षात आले संस्थेजवळ रिक्षा  आल्यावर त्याला मी पैसे दिले आणि त्याला म्हटलं तुला शाळा पाहावयाची आहे का? .. तो म्हणाला हो मला खूप आवडेल…. मग मी त्याला संस्थेत घेऊन आले प्रत्येक वर्गात त्याला फिरवलं त्याची थोडी माहिती मुलांना दिली आणि मुलांना म्हणाले बघा त्याची इच्छा असून त्याला शिकता येत नाही तुम्ही नापास झाला तरी तुम्हाला पालकाने पुन्हा शिकण्याची संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करा मग तोही मुलांना म्हणाला… अरे खूप चांगले चांगले शिक्षक तुम्हाला मिळालेले आहेत आणि आई बाबा सुद्धा छान आहेत.. शिकल्यावर तुम्हाला चांगले काम मिळेल आणि तुमचे आयुष्य सुधारेल 

….त्याच्या परी तो दोन वाक्य बोलून गेला चारही वर्गातून आल्यानंतर मी त्याला दारापर्यंत सोडायला गेले काही झालं तरी तो तरुण पोरगा होता त्याच्या मनामध्ये अशा अस्था निर्माण झाल्याच पाहिजेत त्याने मला मध्येच प्रश्नही विचारला तुम्ही याचा पगार घेता का? मी म्हणाले नाही एक रुपया सुद्धा घेत नाही त्याला त्याचे खूप आश्चर्य वाटले होते दारापर्यंत आल्यावर तो मुलगा मागे वळला आणि झटकन माझे दोन्ही हात हातात घेतले थोडासा झुकला आणि म्हणाला “आप महान पुरुष हो “…हे कुठेतरी बहुदा त्याने वाचलेले किंवा ऐकलेल वाक्य असावं मला खूप हसायला आलं तो प्रचंड भारावलेला होता मी म्हणलं नाही नाही महान स्त्री हू असं म्हण पाहिजे तर पुरुष नको रे त्यावर तो हसला …वही वही… आम्हाला कुठल्या एवढ्या चांगलं बोलता येते मॅडम तुम्ही मला एवढ्या प्रेमाने शाळा दाखवली लय छान वाटलं लई मोठं काम करता हो तुम्ही खरच मॅडम तुम्ही महान आहात!… मी म्हणलं नाही अरे प्रत्येकाने समाजासाठी असं थोडं काम करायलाच पाहिजे अगदी तू तुझ्या रिक्षात सुद्धा एखादा गरजू आजारी म्हातारा माणूस फुकट नेऊन सोडलास किंवा अडवाडवी न करता सोडलास तरीसुद्धा ते एक मोठं काम आहे हे लक्षात ठेव….! त्याने पुन्हा एकदा माझ्यासमोर कमरेपासून मान झुकवली आणि हसत हसत तो रिक्षा घेऊन निघून गेला……..! 

मला वाटतं आपल्या तरुण मुलांना अशा कामाची ओळख करून देणे गरजेचे आहे तर त्यांच्यामध्ये आपण असं काम करावं अशी भावना निर्माण होईल त्यांच्यासमोर जो आदर्श असेल तो त्यांना नक्की भारावून टाकतो शाहरुख खान सलमान खान हे आज त्यांचे आदर्श झालेत तेही कदाचित खूप चांगलं काम करत असतील पण त्यापेक्षा ते जे पात्र साकारतात त्याच्यावर त्यांचे प्रेम असते त्या पात्राच्या आदर्श भूमिकेवर नसते आता तरुण मुलांचे हिरो बदलण्याची गरज आहे त्यासाठी त्यांना चांगले काही दाखवणे आणि ऐकवणे   गरजेचे आहे असे मला वाटते तुम्हाला ही असेच वाटते ना?…. मग आपण एक छोटासा आदर्श त्यांच्यासमोर उभा करायला काय हरकत आहे….!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “फॅमिली डॉक्टर” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “फॅमिली डॉक्टर” ☆ श्री मंगेश मधुकर 

क्लिनिकमध्ये एसी चालू होता तरी घाम फुटलेला कारण समोर डॉक्टर माझे टेस्ट रिपोर्ट तपासत होते.डॉक्टरांच्या म्हणजेच राजाकाकांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखेच शांत आणि गंभीर भाव.त्यामुळे धाकधूक वाढली.

‘मन चिंती ते वैरी न चिंती’ हेच खरं.आता काय ऐकायला लागणार?या विचारानं पोटात भीतीचा गोळा आला. 

“तब्येतीकडे फार दुर्लक्ष केलंलं दिसतंय” राजाकाकांनी विचारलं.

“हा थोडसं!!,”

“थोडसं नाही.भरपूर दुर्लक्ष केलंय.रिपोर्ट खोटं बोलत नाहीत”. 

“एनिथिंग सिरीयस”घाबरून विचारलं पण राजकाकांनी काहीच उत्तर दिलं नाही उलट चेहरा जास्तच गंभीर केला तेव्हा धाबं दणाणलं.माझा केविलवाणा चेहरा बघून राजाकाका हसायला लागले.

“अरे गंमत करतोय.उगीच टेन्शन घेऊ नकोस.रिपोर्ट नॉर्मल आहेत.बीपीचा त्रास सोडल्यास विशेष काही नाही.  गोळी सुरु करावी लागेल.”

“तुमची रिअॅक्शन बघून हादरलो ना.”

“सॉरी!!”

“हुssssश!!सुटलो.सगळं व्यवस्थित आहे ऐकून जीव भांड्यात पडला.आता टेंशन नाही.या तब्येतीच्या नादात बरीच काम राहिलीत.थँक्यू सो मच!!”

“ओ मिस्टर,एकदम उड्या मारू नका.१०० % फिट नाहीयेस.कसाबसा काठावर वाचलायेस.आता लक्ष दिलं नाही तर नंतर गंभीर परिणाम भोगावे लागतील.”

“म्हणजे”

“अजून चाळिशी गाठली नाहीस तरी ब्लडप्रेशरचा त्रास.हे चांगलं लक्षण नाही.पळापळ कमी कर.जरा जीवाला विश्रांती दे.लाईफ स्टाईल बदलावी लागेल.”

“येस!!सगळं करतो.आज महत्वाची मिटिंग आहे.आत्ता ऑफिसला गेलं पाहिजे.”

“पालथ्या घड्यावर पाणी!!जरा तुझ्या बायकोला फोन लाव.”

“का?काय झालं?आत्ता तर म्हणालात की सगळं नॉर्मल आहे म्हणून…”

“तुला हॉस्पिटलमध्ये एडमीट करतो म्हणजे गप्प बसशील.सक्तीचा आराम.कंपनीसुद्धा ऑब्जेक्शन घेणार नाही.चार दिवस मस्त निवांत रहा.फक्त मोबाईल मिळणार नाही.चालेल”. 

“प्लीज,प्लीज नको,मी काळजी घेईन.सर्व सूचना फॉलो करीन.बाकी तुम्ही आहातच.”

“हे बऱयं,स्वतः कसंही वागायचं आणि डॉक्टरांना सांभाळायला सांगायचं.मला सांग, भविष्यासाठी प्लानिंग केलं असशीलच.सेविंग,इन्व्हेस्टमेंट,प्रॉपर्टी वैगरे वैगरे….”

“ते तर केलचं पाहिजे ना.” 

“मग ज्याच्या भरोशावर हे सगळे करतोस त्या शरीरासाठी काही इन्व्हेस्टमेंट केलीय का?”

“समजलं नाही”

“बहुतेकजण स्वतःच्या तब्येतीसाठी काहीच करत नाही.स्वतःला गृहीत धरून मला काही होणार नाही.एकदम फिट आहे या भ्रमात राहतात आणि आजारी पडले की घाबरतात.एक गोष्ट कायम लक्षात ठेव अचानक कोणताही आजार होत नाही.आपलं शरीर वेळोवेळी सूचना देतं परंतु त्याकडं दुर्लक्ष केलं जातं.आवश्यक ती काळजी घेतली जात नाही आणि मग त्रास वाढल्यावर डॉक्टरांकडे जातो.तिथंही घाई असतेच.चटकन बरं व्हायचं असतं.”

“काका,मनातलं बोललात.मनकवडे आहात.”

“साधी गोष्ट आहे रे.तब्येत ठणठणीत तर सगळं चांगलं.नाहीतर काहीही उपयोग नाही.स्वतःच्या बाबतीत केला जाणारा बेफिकिरी हा फक्त तुझाच नाही तर अनेकांचा प्रॉब्लेम आहे.” 

“खरंय,कामाच्या टेंशनमुळे खूप दिवस डिस्टर्ब आहे. शांत झोप नव्हती. जेवण जात नव्हतं.डोकं दुखायचं,अस्वस्थ होतो.

खाण्या- पिण्याचं काही ताळतंत्र नव्हतं.कामाच्या नादात त्रासाकडं लक्ष दिलं नाही.आता असह्य झालं तेव्हा तुमच्याकडे आलो.

“अजूनही वेळ गेलेली नाही.आजपासून आधी स्वतः मग फॅमिली आणि नंतर कंपनीचा विचार करायचा. दिवसातली ३० मिनिटं तरी व्यायाम करायचाच.खाण्यावर कंट्रोल ठेव.मी सांगतो तसं वागलास तर काहीही होणार नाही.”जिवलग मित्रासारखं राजकाकांनी समजावून सांगितलं.काकांशी बोलल्यावर एकदम फ्रेश वाटलं.

राजाकाका, वयाची सत्तरी पार केलेली तरीही तरुणांना लाजवेल असा उत्साह, पूर्णपणे फिट, प्रसन्न आणि बिनधास्त डोळे झाकून विश्वास ठेवावा असं व्यक्तिमत्व.आमचे फॅमिली डॉक्टर.आजोबा नंतर बाबा आता मी आमच्या तीन पिढ्या त्यांच्याकडून औषध घेतोय.राजाकाका म्हणजे कुटुंबाचाच भाग.आमच्याप्रमाणे अनेकांचे फॅमिली डॉक्टर होते. 

आजच्या काळात अनेक डॉक्टर्स भरमसाठ फी घेतात,गरज नसताना वेगवेगळ्या टेस्ट करायला लावतात याची राजकाकांना प्रचंड चीड होती कारण काकांची डॉक्टरकी ही ओल्ड मेथड होती.पेशंटचं पूर्ण ऐकून त्याला हवा तेवढा वेळ देऊन त्रास समजून घ्यायचा.त्यावर आधी बिनखर्चाचे उपाय सुचवायचे आणि आवश्यकतेनुसार उपचार करायचे.नेमकी औषधं आणि काळजी घेतली तर पेशंट नक्की बरा होतो हा आजवरचा अनुभव.अगदीच आजार गंभीर असेल तरच आवश्यक तपासण्या करण्याचा सल्ला.पेशंट हॉस्पिटलमध्ये असेल तर कोणतीही व्हिजिट फी न घेता स्वतःहून भेटायला जाणार.

त्याकाळच्या  असलेल्या ‘फॅमिली डॉक्टर’ या संकल्पनेचं “राजाकाका” हे मूर्तिमंत प्रतीक. 

सुमारे २५ वर्षापूर्वी ‘फॅमिली डॉक्टर’ सगळीकडे होते. त्यांच्याकडे जाताना अपॉटमेंट वैगरेची भानगड नव्हती. पैसे असले-नसले तरी उपचार व्हायचे. औषधं मिळायची. कधी गरज पडली तर एक्स्ट्रा चार्ज न घेता डॉक्टर घरीसुद्धा यायचे. कौटुंबिक समारंभात डॉक्टरांचा सहभाग हा ठरलेलाच. इतर अडी-अडचणींच्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला जायचा. पेशंट आणि डॉक्टर एवढ्यापुरतं न राहता परस्परांशी प्रेमाचं ,जिव्हाळ्याचं आणि माणुसकीचं नातं होतं.

—–

आजच्या स्पेशालीस्ट,सुपर स्पेशालीस्टच्या जमान्यात ‘फॅमिली डॉक्टर’ संकल्पना जवळपास संपली.हॉटेलसारख्या टापटीप,चकचकीत क्लिनिकमध्ये डॉक्टर आणि पेशंट यांच्यात फक्त व्यवहार होतो.जेवढ्यास तेवढं बोलणं.आपुलकी वैगेरे काहीही राहिलं नाही.

“माणसापेक्षा पैसा मोठा झाला अन दवाखान्याचं दुकान झालं.” अशावेळी सगळ्यात मोठी उणीव भासतेय ती फॅमिली डॉक्टरांची.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘‘विठ्ठल ‘पांडुरंगमय’ झाला…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘विठ्ठल ‘पांडुरंगमय’ झाला…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

ज्यांचे जीवनच सारे..‘गमप’मय झाले होते, त्या आदरणीय लोकशाहीर  विठ्ठल उमपांचा आज जन्मदिन. त्यानिमित्त त्यांच्या बरोबरच्या काही सुंदर आठवणी भराभरा जाग्या झाल्या, त्या तुमच्याबरोबर शेअर करत आहे. 

काही वर्षांपूर्वी एका टीव्ही चॅनलसाठी उमपांचं आणि माझं गाण्याचं शूटिंग होतं. माझं गाणं झाल्यावर मी उमपांना ऐकण्यासाठी थांबले आणि इतका ‘पांडुरंगमय झालेला विठ्ठल’ मी प्रथमच पहिला! परमेश्वराला अत्यानंदानं आळवीत, ते ‘स्वरचित’ काव्य गात होते… 

गोरोबाच्या हाती, मातीचा चिखल

बोलतो विठ्ठल पांडुरंग… ||१||

*

सावतामाळी तो मळ्यात राबता

मळा होई बोलता, पांडुरंग… ||२||

*

नामदेव शिंपी शिवताना कपडे,

शिलाई ओरडे पांडुरंग… ||३||

*

विठ्ठल अभंग – गातो रे विठ्ठल

ऐकतो विठ्ठल – पांडुरंग… ||४||

एखादा चित्रपट पहावा, त्याप्रमाणे त्यांच्या ओठून शब्द सहजपणे ‘जिवंत’ होऊन येत होते. स्टुडिओची ‘पंढरी’ झाली होती! साक्षात् विठ्ठलाचं दर्शन त्यांनी आम्हाला घडवलं.  परमेश्वराशी तद्रुप होणं म्हणजे काय, याचा सुंदर आविष्कार होता तो! प्रत्येक अंतऱ्यागणिक डोळ्यांत पाणी आणि अंगावर काटा येत होता! 

त्यानंतर एकदा उमपांनी मला ‘जांभूळ आख्यान’चं निमंत्रण दिलं. मुलाच्या परीक्षेमुळे लवकर परतायचं ठरवूनही, संपूर्ण आख्यान पाहूनच घरी आले. खुर्चीला खिळवणारं हे संगीत आणि नृत्यही भारावून टाकणारं होतं. परमेश्वरानं दिलेल्या पुरुषी रूपातही ७८ वर्षांच्या (त्यावेळी) उमपांनी साक्षात् सुंदर कोवळी द्रौपदी ‘जिवंत’ उभी केली. पांडवांच्या अनुपस्थितीत कर्ण आल्यावेळी, तिचं कर्णाला पाहून लाजणं, मिलनोत्सुक होणं, अधीर होणं आणि पांडवांसमोर, कृष्णाने सत्य उघड केल्यावर बिथरणं, सारं इतकं थरारक, की प्रत्येक श्रोता ‘स्वतःतच’ द्रौपदीला अनुभवत असावा! या वयात त्यांचा स्टेजवरील वावर, खड्या आवाजातील भावस्पर्शी गाणं, अभिनयाच्या बादशहालाही लाजवेल असा अलौकिक आविष्कार पाहून वाटलं, देहभान विसरून कलेचा ‘परमोच्च आनंद’ घेणं म्हणजेच  ‘अध्यात्म’!

मी महाराष्ट्र टाइम्समध्ये ‘माझं अध्यात्म’ या सदरात त्यांच्या ‘जांभूळ आख्यान’ मधील मला अत्यंत अध्यात्माविषयी लिहिलेलं वाचून उमपांचा मला फोन आला. ते म्हणाल, “पद्मजा ताई, तुम्हाला संतांचं संचित मिळालं आहे. एखाद्या पोक्त माणसानं इतरांबद्दल मनमोकळेपणे, मुक्तपणे लिहावं, तसं स्वानुभवाचं गांठोडं तुमच्या आत्म्याच्या कप्प्यातून आलंय. ती दृष्टी तुम्हाला इतक्या लहान वयात मिळाली आहे, ही परमेश्वरी कृपाच!” असं सांगून त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले. 

आजही जांभूळ आख्यानातील ‘अन् कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं…’

या ओळी कानी घुमू लागल्या, तरी उमपांचा चतुरस्र अभिनय डोळ्यांसमोरून हलत नाही!

याच आदरणीय शाहीर विठ्ठल उमपांच्या नावे मला २४ नोव्हेंबर २०१३ रोजी ‘वत्सला प्रतिष्ठान’ तर्फे ‘मृद्गंध’ हा मानाचा पुरस्कार दिला गेला. तो स्वीकारताना विठ्ठल उमपांच्या ‘आठवणींचा गंध’ मला पहिल्या पावसानंतरच्या मृद्गंधासारखाच उत्साहित करून गेला! काव्य, गायन, वादन, लेखन, नृत्य, सर्वच क्षेत्रांत अशी ‘अलौकिक’ मुशाफिरी करणारा असा कलावंत, पुन्हा होणे नाही!

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मॅडम, मी मंगळागौर नाही पूजणार”… – लेखिका : सुश्री दीपा देशपांडे कस्तुरे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ “मॅडम, मी मंगळागौर नाही पूजणार”… – लेखिका : सुश्री दीपा देशपांडे कस्तुरे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

“मॅडम, मी मंगळागौर नाही पूजणार.” एक 27-28 वर्षाची नवविवाहित तरुणी मला स्पष्टपणे म्हणाली. तशी ती कूल होती, नम्रही होती पण ठाम होती.

मी म्हंटल, “नको करू.तुझी इच्छा.पण सगळे हौशीने करायला तयार आहेत, तर तुला का नाही करायची मंगळागौर??”

त्यावर ती उस्फुर्तपणे म्हणाली, “मला ना हे सगळं Illogical आणि Wastage of time वाटतं.”

“तू करूच नको मंगळागौर.पण मंगळागौर म्हणजे नक्की काय, त्यात काय-काय करतात, माहिती आहे का तुला ?” मी तिला विचारलं.

“नाही हो.मंगळागौर म्हणजे दिवसभर पुजा करतात एवढंच माहीत आहे.”

“अगं, दिवसभर कसं कोणी ‘फक्त पुजा’ करेल? ” मी तिला हसतहसत विचारलं.

ऐक, मी सांगते तुला,

“मंगळागौर म्हणजे देवी पार्वतीची पुजा.नवीन लग्न झालेल्या मुली, श्रावणतल्या मंगळवारी ही पुजा करतात.तसा हा सोहळा संपूर्ण दिवसभर असतो. पण पुजा फक्त एकदीड तास.फार फार तर दोन तास.

पुढे दिवसभर गप्पा-गोष्टी, खाणेपिणे, नाचगाणे आणि खेळही असतात.मंगळागौरीसाठी माहेरची माणसं येतात, तसेच तुझ्या सासरचे नातेवाईक पण येतात .सगळे दिवसभर एकत्र राहिले की आपोआप नवीन ओळखी होतात, सुख-दुःखाची देवाणघेवाण होते. आणि नकळत आपल्यातलं बॉण्डिंग वाढत.

तुझ्यासोबत पुजा करायला आणखीन 5 मुली येतात. त्यांचं लग्न सुद्धा अलीकडेच झालेलं असतं. त्या निमित्याने तुझ्याच वयाचं एक friend circle आपसूकच तुला मिळतं . सगळ्यांचे वय सारखे म्हणजे तुमचे बोलायचे विषय सारखे आणि प्रश्नही सारखेच. तेव्हा मैत्री व्हायलाही सोप्प जातं आणि Wave length पण पटकन जुळते.नाही का?

नवी नवरी दुसऱ्या गावावरून आलेली असते, तिला तिच्या वयाच्या मैत्रिणी मिळाव्यात, सुख दुःखाच्या चार गोष्टी बोलायला कोणी असावं, ह्यासाठीच तर ह्या मुली बोलावतात..

संध्याकाळी हळदीकुंकू करतात , त्यात शेजारीपाजारी, इतर ओळखीचे लोक आपण बोलावतो. आपले स्नेही,शेजारी ह्या सगळ्यांची तुला माहिती व्हावी. ह्यासाठी हा सगळा खटाटोप…

थोडक्यात सांगू का, मंगळागौर म्हणजे नव्या नवरीसाठी एक Induction Program च असतो बघ.. 

आणखीन एक गम्मत आहे.मंगळगौरीच्या जेवणाच्या मेनूची.सकाळी पुरणपोळी, कटाची आमटी,चटणी, कोशिंबीर. Full protein rich आणि फायबरयुक्त जेवण.

रात्रीच जेवण तर आणखीन भारी..

भाजणीचे वडे.जे बाजरीचे आणि ज्वारीचे असतात.अगं, Gluten free.ते सगळं भाजलेले असतं म्हणजे पून्हा पंचायला हलकं. सोबत मटकीची उसळ.ऊसळी, कडधान्य म्हणजे प्रोटीन आलंच की.

आणखीन जेवणात असतं ते टोमॅटो सार. श्रावण महिना म्हणजे पावसाळाच.त्या थंड वातावरणात गरमागरम,आंबटगोड टोमॅटो सॉस.. 

आणखीन एक शेवटचं, पण महत्वाचं.. कोणीतरी खूपच Health Conscious, Calorie मोजून जेवणारे किंवा daily gym hit करणारे असतील तर त्यांना सुद्धा Workout आहे..संध्याकाळी जे मंगळागौर खेळ असतात ना ते मस्त Physical Exercise आहेत. सोबत मजबूत Calories burn करणारे आहेत.”

“उत्तम आरोग्य हाच खरा दागिना.” असं म्हणणाऱ्या आपल्या जुन्या लोकांना, “मनातल्या भावनांचा निचरा होण्यासाठी आपलं हक्काचं माणूस लागतं ” हेही चांगलं माहिती होतं.

केवळ Mental piece, stress buster, healthy lifestyle अशा चकचकित टर्म त्यांनी वापरल्या नाहीत म्हणून ते direct Illogical होतात का ?”

सगळं ऐकून झाल्यावर तिला मंगळागौर चांगलीच समजली होती,उमजली पण होती..

तिने मंगळागौर बुक केली.

जाता जाता मला म्हणाली, ” तुम्ही management चा अभ्यास केला का हो? “

छानसं हसून मी तिला उत्तर दिलं,”मी आपल्या पारंपरिक सणांचा अभ्यास केला.. “

लेखिका : सुश्री  दीपा देशपांडे कस्तुरे

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गळके पत्रे, साप, आणि बॅटरी…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “गळके पत्रे, साप, आणि बॅटरी” ☆ सुश्री शीला पतकी 

आज शिकवणीच्या मुली जरा कुडकुडतच आल्या. शाळेतून येताना पावसात भिजल्या होत्या. घरी आल्यानंतर मी त्यांना पुसायला टॉवेल दिला थोडासा आलं घालून चहाही दिला. कारण माझी आई आम्ही शाळेतनं भिजवून गेलो की डोकं पुसायची आणि आम्हाला चहा करून द्यायची, आलं घातलेला…. तिच्या आठवणीने त्यांनाही चहा दिला. त्यानंतर मी त्यांना म्हटलं आज शिकवणे नको आपण थोडीशी वेगळीच चर्चा करूया. मग काय मुलींना आनंदी आनंदच .. 

 मी म्हणाले मुलींनो तुमची काही स्वप्न असतील तुम्ही आमच्या या कॉलनीत येता इथे असलेले सगळी मोठी मोठी बंगले वजा घरं.. प्रत्येकाच्या घरासमोर दोन दोन तीन गाड्या.. समोर विस्तीर्ण पटांगण बाग हे सगळं पाहिल्यावर तुम्हाला वाटत असेल ना की अशी घर आपली असावीत किंवा तुमचं काय स्वप्न असेल ते ते सांगायचं प्रत्येकाने…..! 

खुशी पटकन उठून म्हणाली;” बाई मी सांगते” मी म्हणलं सांग, ती म्हणाली, “आम्हाला असली मोठी घर वगैरे काही नको फक्त आमच्या घरावर जे पत्रे आहेत ते गळके देऊ नको चांगले पत्रे दे देवा “.मला काही उलगडा झाला नाही .मी म्हणाले म्हणजे? त्या म्हणाल्या,” अहो बाई आमचं घर सर्व पत्र्यातच आहे मातीच जोत उचलून घेतलेल आहे आणि त्यावर सर्व बाजूंनी पत्रे ठोकलेले आहेत सगळं घरच पत्र्याचे” 

मग त्या सगळ्याच मुली एका मागून एक बोलत्या झाल्या. म्हणाल्या बाई आम्हाला ना थंडीच्या दिवसात वरचे बाजूचे सगळे पत्रे थंड पडतात खाली फरशीमुळे जमीन थंड होते चुकून एखादं भोक जर पत्र्याला पडलेल असेल तर त्यातून लई गार वारा येतो आणि इतकी थंडी वाजते झोपच येत नाही दुसरी म्हणाली उन्हाळ्यात ते सगळं तापतं मग आम्ही समोरच्या झाडाखाली बसतो अंकिता म्हणाली आणि पावसाळ्यात चांगल्या जागेवर म्हातारी माणसं कामाला जाणारी माणसं झोपतात उरलेल्या जागेत  रात्रभर आम्ही गळक्या पत्र्याखाली भांडे भरत बसतो रात्री काय झोप मिळत नाही लाईट गेली असली तर बघायलाच नको….. 

गुड्डी म्हणाली बाई परवा आमच्याकडे तर साप निघाला मोठा…. वडिलांच्या उशाखाली होता चार दिवस झोप आली नाही आम्हाला…. अंकिता म्हणाली बाई माझे नवे बूट बाहेर ठेवले होते तर कुत्र घेऊन गेला .त्यावर गुड्डी म्हणाली आणि माझ्या घरात ठेवले होते तर उंदराने कुरतडले .बाई ते बूट ना आम्ही दुकानात गेलो तेव्हा त्या माणसाने त्याची किंमत पाचशे रुपये सांगितली मग बाबा म्हणाले खूप महाग आहेत सध्या जुनेच घाल मग मी त्या दुकानदार काकांना म्हणाले ओ काका द्या ना तीनशे रुपयांमध्ये मला तुमची मुलगी समजून द्या ना आम्हाला परवडत नाही पाचशे रुपये  आणि मग एवढं म्हणल्यावर त्या काकांनी मला बूट दिले आणि ते उंदराने कुरतडले. गुड्डी अगदी उत्साहात येऊन पुढे सांगत होती ..

बाई रात्री तर आम्हाला लय भ्या वाटतं आमच्या घरात बाथरूम नाही सरकारी संडासमध्ये बाथरूमला जावं लागतं ते घरापासून लांब आहे आई-बाबा दमलेले असतात आईला उठवलं तर ती लवकर उठत नाही अन मला बाथरूमला दम धरवत नाही मग मी एकटी तशीच अंधारात जाते मग अंकिता म्हणाली काही वेळेला तर आम्ही एकमेकांना हाक मारून जातो कारण आमची घर अगदी लागून असतात ना …मग मी विचारलं,” मग आंघोळीचं काय करता?” तेव्हा त्यामध्ये तीने सांगितले तुटके पत्रे लावून थोडी भिंत केली आहे त्याला बाजूने तरट लावतो आणि त्याच्यात आंघोळ करतो ….

सगळ्या मुली जे सांगत होत्या ते कल्पनेच्या पलीकडचे होते मी ताबडतोब माळ्यावरची जादाची पांघरूणे आणि रग काढले सतरंज्या काढल्या आणि त्यांना त्या वाटून टाकल्या म्हणलं किमान खाली दोन एक सतरंज्या एकावर एक घालून जाड करून झोपा रग घ्या त्याशिवाय माझ्या मैत्रिणीने त्यांच्यासाठी दिलेल्या पैशातून मी त्या सगळ्यांना एक एक बॅटरी घेऊन दिली अंधारात जात जाऊ नका. सोबत घेतल्याशिवाय जाऊ नका आता तुम्ही मोठ्या व्हायला लागलेला आहात. आसपासचे लोक चांगले नसतात… खूप गोष्टी मी त्यांना समजावून सांगितल्या. 

….  पण ती रात्र माझी अस्वस्थपणात गेली माझ्या पक्क्या बांधलेल्या घरात उबदार पांघरुणात मला शांत झोप येत नव्हती केवढी ही विषमता आमच्या मुलांना आम्ही किती जपतो जाड जाड रग मऊ गाद्या पावसाळा म्हणून विक्स लावा पायमोजे घाला  मफलर  बांधा आणि इथं ही फुलं त्या चिखलातही फुलत होती त्यांना आज कुणीतरी सगळे ऐकून घेणारा भेटल होत त्या सगळ्या मुली चौफेर माझ्याशी भरभरून बोलत होत्या आणि मी त्या अनोळख्या जगाची ओळख करून घेत होते हे सगळं आपण पाहिलेलं असतं वाचलेलं असतं पण प्रत्यक्ष अनुभवणारी लहान लहान लेकरं हे जेव्हा सांगतात तेव्हा वाटतं देवा असं का रे?… हा न्याय आहे ..?ही सगळी मुलं तुझीच रुप आहेत ना मग त्यांना सगळ्यांना सारखाच न्याय देना…! बहुधा देवानं माझी प्रार्थना ऐकली असावी माझ्यासारख्या एका प्रामाणिक संवेदनाक्षम शिक्षकाचे त्याच्याशी कनेक्शन झाल असावा 

या वर्षाच्या सुरुवातीला मुली मला सांगत आल्या बाई बाई आमचं घर मंजूर झालं बाई आमचं घर मंजूर झालं मला काहीच कळलं नाही त्या म्हणाल्या ती सगळी झोपडपट्टी जी आहे तिथे पक्की घर बांधायची आहेत त्यासाठी आमचे कागदपत्र भरून नेले आणि आता आम्हाला अडीच लाख रुपये मंजूर झाले ..!रमाई आवास योजनेअंतर्गत त्यांना ती रक्कम मिळाली या चार-पाच महिन्यात त्यांची घर बांधून झाली  पुढच्या महिन्यात त्यांच्या घराच्या वास्तुशांतीच्या पूजा होतील आणि मुली पक्क्या घरामध्ये राहायला जातील. घर मंजूर झाले हे सांगताना त्यांचा आनंद एवढा होता की विचारू नका ..

मी देवाला प्रार्थना केली देवा किमान प्रत्येकाला एक घर अंगाला अंग झाकेल असं पूर्ण वस्त्र दोन वेळचे चांगले जेवण पोटभर मिळू दे इतकं तरी दे बाबा ! मोदींच्या रूपाने परमेश्वरच त्यांना या सुविधा देत आहे असे वाटते ते काही असो पण माझ्या मुलींचं गळके पत्रे ते पक्की घरे हा प्रवास रोमहर्षक होता कारण मला ते दुःख ठाऊक होते पाच रुपयाच्या दोन खोल्याच्या भाड्याच्या घरातून तीन खोल्यांच्या बंगल्यात येताना माझा जो कष्टमय  प्रवास झाला होता त्याची मला आठवण झाली मी परमेश्वराला म्हणून म्हटलं त्यांना छान घर दिलेस त्यांच्या घरात आनंदही नांदू दे नाहीतर बापाने दारू पिऊन धिंगाणा घालण्यासारखं घर देऊ  नकोस” घर असू दे घरासारखे नकोत नुसत्या भिंती…..

 ” परमेश्वरा तुझे अस्तित्व तेथे असू दे आणि सगळ्यांना चांगली बुद्धी दे..!!! “

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘‘सोनपाखरे टिपावी किती वाकूनी वाकूनी…’’ भाग – २ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘सोनपाखरे टिपावी किती वाकूनी वाकूनी…’’ भाग – २ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

इंदिराबाई

(“लाडके इंदिरे, तुझा सोहळा शानदार होणार आणि तो अनुपम व्हावा हीच माझी इच्छा आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद गौरवण्यापेक्षा, हा खऱ्या रसिक चाहत्यांचा मेळावा कितीतरी भव्य आणि तुझ्या काव्यावर लुब्ध असलेला आहे. मी शरीराने त्यात नसले, तरी मनाने त्यात आहे बरं का!” तुझी दुर्गाबाई.) – इथून पुढे 

इंदिराबाईंना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद न मिळाल्याची खंत मात्र या प्रिय मैत्रिणीच्या पत्रात जाणवते. तसंच इंदिराबाईंनाही दुर्गाबाई म्हणजे त्यांच्या साहित्याचा आधार वाटतात. दोघीही मनस्वी, प्रखर स्वाभिमानी आणि विदुषी असल्या तरी दोघींचं एकमेकींवर जबरदस्त प्रेम! एकमेकींविषयी आदर आणि ओढ पाहून मला अनेकदा डॉ. आनंदीबाई जोशी आणि पंडिता रमाबाई आठवतात. अशा या इंदिराबाई आणि दुर्गाबाईंच्या पत्रांचे ‘पोस्टमन’ होण्याचे भाग्य मला लाभले!

इंदिराबाई म्हणतात, “सर्वसामान्य लोकांच्या भावनांना स्पर्श करण्याचं सामर्थ्य ज्याप्रमाणे माझ्या कवितेत नाही, त्याप्रमाणे ते माझ्या वाचनातही नाही. माझ्या कवितेची लोकप्रियता ही विशिष्ट लोकांपुरतीच आहे.” हे वाचून ‘जो संग तुझपे गिरे, और जख्म आये मुझे’ अशी माझी अवस्था झाली. आता तर माझा सर्वतोपरी हट्ट असतो की, प्रत्येक कार्यक्रमातून इंदिराबाईंच्या काव्यरत्नांचे हार पेटीत केवळ जपून न ठेवता, जास्तीत जास्त (अ)सामान्य रसिकांसमोर उलगडून दाखवावेत. हा माझा खारीचा प्रयत्न जरी असला तरी तो (सर्व)सामान्यांचेही हृदय पाझरवणारा आहे, हे मी प्रत्यक्ष मैफिलीत अनेकदा अनुभवले आहे.

कुणी निंदावे त्याला, करावा मी नमस्कार  

कुणी धरावा दुरावा, त्याचा करावा मी सत्कार!

असे साधेसुधे सूत्र घेऊन जगणाऱ्या इंदिराबाईंच्या कविता म्हणजे तरलता, निसर्गरम्यता आणि भावनांनी ओथंबलेल्या तरल कवितांचा मोरपिशी स्पर्श! भावनांचे हळवे प्रकटीकरण म्हणजे इंदिराबाईंची लेखणी! 

इंदिराबाईंची कुठलीही कविता वाचताना चित्ररूप डोळ्यासमोर येते, ही तिची ताकद आहे. त्यांची ‘बाळ उतरे अंगणी’  म्हणताना तर दुडुदुडु धावणारं गोंडस बाळ डोळ्यासमोर येतं. अक्कांचं खास वैशिष्ट्य म्हणजे निसर्गातील कुठल्याही अजीव वस्तूतसुद्धा अक्कांना चैतन्य दिसतं. त्यात बाळाच्या पायाला स्पर्श करणारी ‘मऊशार काळी मखमली माती’ आणि ‘चिमुकल्या अंगणाची बाळाभोवती राखण’ म्हणताना सजीव होऊन माती आणि अंगण बाळाभोवती प्रेमाची पखरण करतात असं जाणवतं.

‘किती दिवस मी मानीत होते,

ह्या दगडापरी व्हावे जीवन

पडो ऊन वा पाऊस त्यावर,

थिजलेले अवघे संवेदन

दगडालाही चुकले नाही,

चुकले नाही चढते त्यावर

शेवाळाचे जुलमी गोंदण,

चुकले नाही केविलवाणे

दगडफुलाचे त्यास प्रसाधन!’

दगडासारख्या निर्जीव गोष्टींमधेही सजीवपणा जाणवणारं किती संवेदनशील मन असेल अक्कांचं! गंमत म्हणजे ‘वंशकुसुम’ हा कवितासंग्रह तर पारिजातकाच्या फुलाला वाहिलाय त्यांनी!

‘काय बाई सांगू कथा, क्षण विसावा भेटतो,

गुलबाशीच्या फुलासंगे, पुन्हा दीस उगवतो..

काय बाई सांगू कथा, पाणी आणून डोळ्यात

एवढेच बोलली ती, घागरीला हात देत…’

या कवितेत तमाम ‘स्त्री’जातीची कथाच (नव्हे व्यथाच) अवघ्या चार ओळीत वर्णिलेली आहे. ‘अल्पाक्षरी’ कवितेत इंदिराबाई वैश्विक सत्य अगदी सहजपणे सांगून जातात.

‘दारा बांधता तोरण घर नाचले नाचले

आज येणार अंगणी सोनचाफ्याची पाऊले…

सूर्यकिरण म्हणाले, घालू दारात रांगोळी

शिंपू पायावरी दव, म्हणे वरून पागोळी…!’

अशा कविता म्हणजे अक्का आणि निसर्ग अशी नात्याची सुंदर गुंफण आहे. त्यांची प्रत्येक कविता, एखादं फुलपाखरू जसं अलगद फुलावर बसावं तशी, किंवा एखाद्या दवबिंदूप्रमाणे तरल आहे. दवबिंदूला जसे स्पर्श करतानाच, तो फुटून जाईल की काय, या भीतीनं या कवितेतील कवितापण जपायचा मी प्रयत्न करते, कारण प्रत्येक कविता ही त्या कवीचं ‘बाळच’ असते.

‘कसे केव्हा कलंडते, माझ्या मनाचे आभाळ

दिवसाच्या राखेमध्ये, उभी तुळस वेल्हाळ!’

यातील ‘तुळस वेल्हाळ’ म्हणजे अक्कांचा ऑटोग्राफच किंवा सहीच जणू! अक्कांची 

‘किती उशिरा ही ठेच, किती उशिरा ही जाण

आता आजपासूनिया माझे, आभाळाचे मन’

ही आत्मस्पर्शी, आत्मभान असलेली कविता वाचून तर माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. प्रत्येकानं आभाळाचं मन ल्यायचं ठरवलं, तर या धर्तीवर केवळ आनंदच उरेल नाही?

इंदिराबाईंच्या शांत, सौम्य स्वभावाचा आणखी एक वेगळा पैलू त्यांच्या प्रारब्ध या कवितेत जाणवतो. प्रारब्धालाही ठणकावून सांगणाऱ्या व प्रसंगी मन कठोर करणाऱ्या अक्का म्हणतात, 

‘प्रारब्धा रे तुझे माझे,

नाते अटीचे तटीचे

हारजीत तोलण्याचे,

पारध्याचे सावजाचे…

जिद्द माझीही अशीच,

नाही लवलेली मान,

जरी फाटला पदर, 

तुझे झेलते मी दान…

काळोखते भोवताली 

जीव येतो उन्मळून,

तरी ओठातून नाही,

*_ तुला शरण शरण…!’_*

ही कविता कठीण प्रसंगी ताठ मानेनं उभ राहण्याचं बळ देते. तसंच, पती ना.मा. संत गेल्यावर लिहिलेली,

‘कधी कुठे न भेटणार,

कधी काही बोलणार

कधी कधी न अक्षरात, 

मन माझे ओवणार

व्रत कठोर हे असेच, 

हे असेच चालणार…’

यात अक्कांचं, सात्विक, सोज्वळ, तेजस्वी, ओजस्वी आणि निश्चयी व्यक्तिमत्त्व दिसून येतं. “चाकूने किंवा सुरीच्या टोकाने मनगटावर घाव करावेत आणि त्यातून आलेल्या रक्ताच्या थेंबाकडे बघत रहावं, तशा या माझ्या कविता आहेत.” अशी प्रतिक्रिया स्वतःच्या कवितेकडे पाहताना फक्त इंदिराबाईच लिहू शकतात.

‘मराठी काव्याला पडलेली एक सुंदर मोरस्पर्शी निळाई’ असं कवयित्री शांताबाई शेळके  इंदिराबाईंबद्दल म्हणतात, तेव्हा मी अक्कांच्या निळाईत बुडून जाते आणि वाटतं….. 

किती तुला आठवावे, किती तुला साठवावे,

जिवाभावा एक ध्यास, एकरूप व्हावे व्हावे!

सूर्याचे तेजःकण आणि चंद्राची शीतलता त्यांच्या लेखनात आहे. चंद्रसूर्याची साथ आपल्याला आयुष्याच्या अंतापर्यंत आहे, तशीच साथ मला इंदिराबाईंच्या तेज, रंग, रूप, गंध ल्यालेल्या कवितेची आहे. सोनचाफ्याच्या पावलांनी माझ्या घरी आलेल्या त्यांच्या कविता म्हणजे आनंदी पाखरंच आहेत! म्हणूनच इंदिराबाईंच्याच शब्दांत म्हणावसं वाटतं…..

गेली निघून हासत, घर भरले खुणांनी

सोनपाखरे टिपावी, किती वाकूनी वाकूनी…!

— समाप्त — 

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ५ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – ५ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टूडे)

हे देखील करायला हवे…

“…भांडता सुद्धा आलं पाहिजे. आपली बाजू प्रभावीपणे मांडता आली पाहिजे. भांडण करणं म्हणजे दादागिरी करणं, दहशत निर्माण करणं, अथवा उद्धटपणा दाखवणं

असा अर्थ नव्हे. आपली अस्मिता विनाकारण दुखावली गेली अथवा पणाला लागत असेल तर भक्कमपणे बोलणं

आपल्याला जमलं पाहिजे.”

असं पपा नेहमी सांगायचे. एकीकडे शालीनता, नम्र वाणी, शब्दातील गोडवा जपणे, कुणाला दुखावलं जाईल असं न बोलणं, अशा तर्‍हेचे बोधामृत प्राशन करीत असताना मध्येच ‘”तुला उत्तम भांडताही आलं पाहिजे हं !!”

असं जेव्हां पपा सांगायचे तेव्हां या विरोधाभासाची

मला नुसती गंमतच नव्हे तर आश्चर्यही वाटायचं.

पण त्याचा प्रत्यय यायचा होताच.

एकदा गणिताच्या पेपरात ,वेगळ्या पद्धतीने गणित सोडवल्यामुळे, उत्तर बरोबर असतानाही त्या उदाहरणाला बाईंनी मला मार्क्स दिले नाहीत. परिणामी त्या दोन मार्कांनी माझा क्रमांक एकाने खाली गेला. मी खूप खट्टु झाले होते. माझ्या पद्धतीने यथाशक्ती मी गणिताच्या बाईंना “माझे मार्कस उगीच कमी केले”  असल्याचे निदर्शनास आणून दिले होते पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.  बाईंची प्रतीक्रिया शून्य होती. मी आपली “जाऊदे”  या मोड मधेच राहिले. गेला नंबर मागे तर गेला..असं मुळमुळीत धोरण धरुन गप्प बसले.

तेव्हां पपा म्हणाले ,”प्रश्न गुणानुक्रमाचा नाहीय्. तुला जर खात्री आहे, तुझं गणित बरोबरच आहे तर ते पटवून देण्यात कमी का पडावंस? तू मुख्याध्यापिकांना सांग.”

“पपा,तुम्ही भेटाल का त्यांना? एकदम मुख्याध्यापिकांना

भेटायची मला भीती वाटते.”

“नाही मी नाही भेटणार त्यांना.हे तुलाच करायचेय्. हा तुझा प्रश्न तुलाच सोडवायचाय्. आधी पटवून देण्याचा प्रयत्न कर, नाहीतर  भांड त्यांच्याशी तुझ्या हक्काच्या मार्कांसाठी. काही हरकत नाही.”

“पण पपा त्यांनी मला बेशिस्त वर्तनासाठी शिक्षाच केली तर?.”

“बघूया.” पपा एव्हढच म्हणाले.

पण एक पलीता पेटवला होता मनात.

मग मी भीतभीतच, दुसर्‍या दिवशी माझा गणिताचा पेपर घेऊन मुख्याध्यापिकांच्या रुममधे गेले. तशी शाळेत वर्गाच्या कामानिमीत्त मी अनेक वेळा इथे आले होते. डेंगळे बाई चांगल्या स्वभावाच्या होत्या. प्रेमळ, समंजस,  रागवायच्या पण तरी आदर वाटायचा त्यांच्याबद्दल. पण यावेळी कारण वेगळं होतं. म्हणून फार दडपण आलं होतं. पाऊल पुढे मागे होत होतं. “जाऊच दे”  वाटत होतं. पपा काहीही सांगतात.मदत तर करत नाहीत.

त्यांचाही थोडासा रागच आला होता मला पण नेहमीप्रमाणे त्यांच्या डोळ्यातील तीक्ष्ण झाक माझा विश्वास बळावत होती. माघार का? हेही बळावत होतं.

मग मी धैर्य गोळा करुन डेंगळे बाईंना माझी समस्या सांगितली.  “मला वर्गात शिकवलेल्या पद्धतीनेही

गणित सोडवता येत होतं पण ही पद्धत थोडी कमी लांबीची व सोपी वाटली म्हणून मी ती वापरली” वगैरे सर्व मी त्यांना पटवून दिले.मग मुख्याध्यापिका डेंगळे बाईंनी

गणिताच्या बाईंना बोलावून घेतलं. मला जायला सांगितलं.

“मी बघते काय ते” असंही म्हणाल्या.

दुसर्‍या दिवशी गणिताच्या बाईंनी माझे प्रगती पुस्तक मागवले. पेपरातले दोन मार्क्स वाढवले आणि वरचा क्रमांकही दिला.

मला न्याय मिळाला. माझ्या बोलण्याचा उपयोग झाला.

पण माझी मैत्रीण जिचा वरचा नंबर मिळाल्याचा आनंद माझ्यामुळे लोप पावला, ती नाराज झाली. मी थेट मुख्याध्यापिकांकडे तक्रार केली म्हणून गणिताच्या बाईंनीही राग धरला. त्यावेळी सर्व वर्गच ,”स्वत:ला काय समजते” या भावनेनी माझ्याशी वागत असल्याचं जाणवलं. काही दिवस हे वातावरण राहिलं.

आजही मनात गुंता आहे. मी बरोबर केलं की चूक?

त्या वेळच्या कारणाची धार आता जरी बोथट झाली असली तरी योग्य ठिकाणी योग्य ते बोलायला कां घाबरायचं?

हे एक सूत्र पुढे अनेक वेळा संरक्षक शस्त्र जरुर बनलं.

अनेक संघर्षाच्यावेळी, अडचणीच्या वेळी त्याने साथ दिली हे मात्र खरं…

– क्रमशः भाग पाचवा 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares