मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१७ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१७ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

बुधवारातली खाऊगल्ली- 

या परिसराचं प्रमुख आकर्षण म्हणजे ‘ बुवा आईस्क्रीमवाले ‘ .. मधुर,मुलायम चवीचं असं सुंदर आईस्क्रीम. आम्हा मुलांचं जीव की प्राण असलेल्या या दुकानाचे नाव ‘बुवा’  का ठेवले असेल? हे कोडं सोडवणं आमच्या बुद्धीपलीकडचं काम होत.आमच्यात तशी खूप चर्चाही व्हायची. शेवटी एकाने दिवे पाजळले, दुकानाच्या मालकांच्या भरगच्च मिश्यांमुळे ते ‘बागूल बुवा’ सारखे दिसतात म्हणून असं नाव ठेवलं असावं. पण काही म्हणा,हे ‘बुवा आईस्क्रीम वाले’ पुण्यात खूप प्रसिद्ध होते. धंदाही दणक्यात चालला होता. 

लग्न  मुंजीसाठी मुहूर्ताची पहिली अक्षत कसबा गणपती पुढे असायची. नंतर दुसरा मान होता जागृत ग्रामदैवत तांबड्या जोगेश्वरीचा. भर उन्हात कसबा गणपतीनंतर श्री जोगेश्वरीला अक्षत देऊन बाहेर पडल्यावर कोऱ्या साडीला खोचलेल्या चार बोटाच्या टिचभर रुमालाने घाम पुसत, नऊवारीचा बोंगा आंवरत, नथीचा आकडा सावरत  वधू माय नवऱ्याला म्हणायची, “ काय बाई हे ऊन !  इश्य ! कित्ती उकडतंय ! अहो आपण आइस्क्रीम खाऊया का गडे ? ” गौरीसारख्या नटून थटून आलेल्या बायकोकडे बघून आणि तिच्या गोड बोलण्याला विरघळून नवऱ्याचं आईस्क्रीमच व्हायचं.आणि मग ती जोडी त्या गारव्यात शिरायची . आम्हाला त्यांच्यामागे दुकानात  शिरावंस वाटायचं.  पण फ्रॉकचा खिसा रिकामाच असायचा. मन मारून मग आम्ही प्रसादाचा, खडीसाखरेचा खडा मिळवण्यासाठी देवीच्या गाभाऱ्यात शिरायचो. आईस्क्रीमची किंमत चार आणे बाऊल होती. ते आम्हाला परवडणार नव्हतं.  त्यापेक्षा फुकटची देवीसमोरची खडीसाखर परवडायची.’– दुधाची तहान ताकावर दुसरं काय ‘—-           

टकलेआत्या नावाची आमची एक मानलेली आत्त्या होती.. त्यावेळची गर्भश्रीमंत, दागिन्यांनी नटलेली, आत्त्या कारमधून उतरली की आम्ही विट्टी दांडू फेकून जीव खाऊन पळत सुटायचो. कारचा दरवाजा उघडायला एकमेकांना ढकलत पुढे जायचो. ही आत्त्या आली की आमचा आनंद गगनाला भिडायचा, कारण श्रीमंत माहेरवाशिणीला कान तुटक्या कपातून पांचट दुधाचा चहा कसा काय द्यायचा ? अशा धोरणी विचाराने आमची आई सौ.टकले आत्यांकरिता चक्क आईस्क्रीम मागवायची.  आम्ही आशाळभूतपणे गुलाबी थंडगार आईस्क्रीमकडे बघत तिथेच घिरट्या घालायचो. आत्याच्या ते लक्षातच यायचं नाही. आत्याचा बाउल साफ- सूफ व्हायचा. आणि मग तिच्या लक्षात आल्यावर ती म्हणायची ,” हे काय वहिनी मुलांसाठी नाही का आईस्क्रीम मागवलत? “ आईला काय बोलावं काही सुचायचंच नाही कारण तिच्याजवळ इतके पैसेच नसायचे. चाणाक्ष आत्या ‘त ‘ वरून ताकभात ओळखायची. आणि मग हळूवारपणे आपल्या मखमली, चंदेरी टिकल्या लावलेल्या बटव्यातून नाणी काढायची, अलगद आमच्या हातावर ठेवून म्हणायची, ” पळा रे पोरांनो आईस्क्रीम खाऊन या. ” हे वाक्य ऐकण्यासाठीचं  तर आम्ही आतुर झालो होतो. पैसे हातात पडताच छताला टाळू लागेल अशी उंच उडी मारावीशी वाटायची. पण मग धाड्दिशी जमिनीवर आदळायचो.कारण आईचे डोळे मोठे झालेले असायचे. आईच्या डोळ्यांकडे नजर गेल्यावर आम्ही चुळबूळ करायचो, आत्या म्हणायची “आईकडे काय बघताय ? मी सांगतेय ना ! हे पैसे घ्या आणि पळा लौकरआणि जा बुवांकडे” .. मग काय आम्ही हावरटासारखे चार आण्याचं नाणं मुठीत पकडून जिन्यावरून एकेक पायरी वगळत उड्या मारत बुवा आईस्क्रीमवाल्यांच्या दुकानात  शिरायचो.आणि मग काय बुवांकडे गुलाबी, पोपटी,पिस्ता आईस्क्रीम खाताना मनांत यायचं आपला ढग झालाय आणि आपण हवेत तरंगतोय.    अहाहा ! काय तो  सुखद गारवा.,काय ती आईस्क्रीमची मिठ्ठास चव, अजूनही जिभेला विसर पडला नाही.आणि मग मनाला सुखावणारा गारवा अंगावर घेता घेता आमची ब्रह्मानंदी टाळी लागायची. स्वर्गच आमच्या हातात आला होता. 

आईस्क्रीमची चटक लागली होती,पण पैशांचा ताळमेळ जमत नव्हता. अखेर पगार झाल्यानंतर माझ्या वडिलांनी ति.नानांनी आईस्क्रीमचा पॉटच घरी आणला. पण तो फिरवतांना नाकी दम आले. घामाच्या धारा लागल्या,  पण नंतर मात्र तीन-तीन वाट्या आईस्क्रीम हादडायला मिळालं . अगदी तुडुंब पोटभर.  

.. .. पण मंडळी गेले ते दिवस,आणि गेली ती आईस्क्रीमची तेव्हाची चव.  

.. .. अजूनही रंग उडालेली –‘ बुवा आईस्क्रीम वाले ‘ —  ही पाटी डोळ्यासमोरून हालत नाहीये बघा ! 

.. मनाचं पाखरू अजूनही  त्या दुकानाभोवती घिरट्या घालतंय… त्या जोगेश्वरीच्या परिसरातच घुमतंय .                                                

– क्रमशः… 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कुंभमेळा… लेखिका : सौ. प्राची सहस्रबुद्धे – वेलणकर ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ☆ मनमंजुषेतून ☆

 ☆ कुंभमेळा… लेखिका : सौ. प्राची सहस्रबुद्धे – वेलणकर ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आतापर्यंत माझ्यासाठी कुंभमेळ्याचा रेफरन्स हा bollywood असल्याने, “कुंभ के मेले मे बिछड गये” हेच माहिती…

पण ह्यावर्षी काहीतरी वेगळे च!  2 /3 मैत्रिणीनी कुंभला जायचे booking केलेले. मला पण विचारलेले पण तसा काही फार इंटरेस्ट येत नव्हता, कारण ” bollywood बॅकग्राऊंड” आणि शिवाय मुलांच्या परीक्षा वगैरे होतेच. आताच भारतात जाऊन आल्याने तसेही काही पुण्याला जायचे वगैरे नव्हते..

पण नाही..कुंभस्नानाचा योग ह्यावर्षी होता..काहीतरी व्हायचे असेल तर “पुरी कायनात” ते पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करते.  पुन्हा बॉलीवूड ज्ञान..

Dettol ची ad असते “सगळ्या germs ना संपवते” आणि मग साधारणपणे तो साबण घ्यायला बळी पडायला होते , काहीसे तसेच कुंभस्नानाबाबतीत झाले. कुंभस्नानाने सगळी पापे धुतली जातील, चक्र align होतील, अशा typeचे इतके फॉरवर्ड्स आले आणि त्यातून विशेष म्हणजे योगींनी केलेल्या व्यवस्थेचे videos. एवढ्या प्रचंड area मध्ये सामान्य लोकांसाठी बांधलेले तंबू , संत महंतांचे आखाडे, खाण्यापिण्याची व्यवस्था, सगळ्यांबद्दल बातम्या,  forwards यांनी social मीडिया वर कुंभमेला गाजायला लागलेला.. मग एक दिवस मैत्रिणीला म्हणाले ,’जाऊया काय?’ तर ती तर तयारच होती , मग आणि एकीला  पण विचारले..झाले .. तिघींचे जायचे तर ठरले..

आधी चर्चा झाली की 28 ला निघायचे , 29 ला शाही स्नान आणि 30 ला परत. मग कळले शाही स्नानासाठी पोचणे मुश्किल आहे, कारण सगळे रस्ते ट्रॅफिक कंट्रोलसाठी ब्लॉक करणार आहेत.

मग शाही स्नानाचा मोह सोडला. मग 31 to 2 फेब जायचे ठरवले. तिघींची सोय बघून ते त्यातल्या त्यात बरे वाटत होते, पण tickets बघितले तर खूप महाग !

मग काय कधी, कसे, असे करताना , 21 ला संध्याकाळी ठरवले, 23 ला निघू.  नवऱ्याकडे पण बॉलीवूड ज्ञानच असल्याने त्याने जायला लगेच होकार देऊन तिकीट बुक करून दिले, “बरंय परस्पर काम झाले तर” असाच विचार असणार.. असा माझा दाट संशय आहे. आता घरातल्या विद्यार्थ्यांच्या exam तारखा पण फायनल कळल्या होत्या. ह्या काळात दोघांचेही अभ्यास करायचे प्लॅन नव्हते, कारण 23 ला दोघांच्या परीक्षा संपणार होत्या .

झालं मग, 23 ला वाराणसीला डायरेक्ट जायचे, 24 ला सकाळी अगदी लवकर उठून प्रयागला जायचे, संध्याकाळी परत यायचे आणि 25 ला परत. अगदी आटोपशीर..

पण देवाच्या मनात better प्लॅन होता.

23 ला आम्ही वाराणसीला 5 ला उतरलो, 6-30 ला ड्राइवर अनिल दुबेना भेटलो , तर त्यांनी सुचवले, की तसेही आताची संध्याकाळची गंगा आरती तुम्हाला मिळणार नाही, उद्या सकाळी निघायच्या ऐवजी आत्ता का निघत नाही. ‘तिथे राहायची सोय नाही’ हे कारण सांगितल्यावर , ‘ते मी बघतो’ असा त्यांनी विश्वास दिला, पण रात्रीची मेळ्याची मजा बघा- हा त्यांचा हट्टच होता. मग काय, मी बरं म्हणाले, प्रयागला जाताना वाटेत त्यांचे घर लागते तर त्यांनी घरी नेले, तिथे भरपूर पांघरूण बरोबर घेतली, घर आणि घरातले खूप छान होते. तिथून निघून 10-45 च्या आसपास प्रयाग ला पोचलो.

त्यांनी त्यांचे शब्द खरे केले. एका पुलावर गाडी उभी केली. इतका सुंदर दिसत होता मेळा. सत्य की स्वप्न प्रश्न पडावा. आम्ही आजूबाजूला लोकांना चालताना बघत होतो. लोकं 8 ते 10 किमी चालत होती, मोठ्या बॅग्स, मुलं बाळ सगळे… आम्हाला इतके लाजल्यासारखे झाले की आम्ही गाडीत निवांत बसलो होतो. लोकांच्या श्रद्धेला नमन करून,  आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

खूप one ways, exit closed ह्यामधून मार्ग काढत तब्बल 45 मिनिटांनी आमच्या ड्राइवरने कुंभ मेळ्यात प्रवेश मिळवला, आणि गाडी डायरेक्ट संगमपाशी, जिथे पार्किंग होते तिथेच नेली. साधारण 11-30 झालेले , तर झोपायला कुठे जागा शोधायची? ह्यावर ड्राइवर काकांनीच ‘गाडीत झोपा’ असा तोडगा काढला. त्यांनीच अंथरूण घालून सीट फ्लॅट करून दिल्या. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी पाठ टेकली. आम्ही तिघी तशाच झोपलो. 

साधारण 3 च्या आसपास जाग आली, बघितले तर एक मैत्रीण जागीच होती, म्हटलं, ‘चल, उठुया’

मग गाडीतून बाहेर आलो, काय व्यवस्था आहे ते बघायला. Lights भरपूर होते. त्यामुळे उजेड होता.  Changing रूम्स, पब्लिक temporary टॉयलेट्स भरपूर होते. णी आपले आपण घेऊन जायचे असल्याने आणि आपले महान लोक तेवढे जबाबदार नसल्याने, आत  सगळेच toilets स्वच्छ नव्हते , पण सरकारने केलेली व्यवस्था चोख होती. वापर करायची अक्कल नसेल तर सरकार काय करणार ! ते असो..

आम्ही फ्रेश झालो. आता आणि काय करणार असा विचार करून ब्रह्म मुहूर्तावर साधारण 3-45am च्या आसपास सरळ गंगेत डुबकी मारायला गेलो. पाणी खूप थंड होते, मी खूप थडथडत होते, पण मारल्या 4/ 5 डुबक्या. कुंभस्नान मिळेल का नाही असे वाटत असताना, देवाने ब्रह्म मुहूर्तवर स्नान घडवले. योगायोगाने तो सुनीताचा तिथीने वाढदिवस होता. मग जरा आवरून चक्कर मारायला बाहेर पडलो. कुठेतरी आत मनात “ब्रह्म मुहूर्तावर स्नान करायला हवे” ही इच्छा होती ती पूर्ण झालेली. एकदम जी मनात  target achieved feeling होते.  कोणालाच आम्ही ह्या कुंभमेळ्याला येण्याबद्दल सांगितले नव्हते कारण आम्हालाच खात्री नव्हती की हे घडू शकेल ..

तर अंघोळ झाल्यावर मेळ्यात tea कॉर्नरला मस्त आल्याचा चहा घेतला.

वाटेत एक आयुषवाल्यांचा  टेंट दिसला, एक बाई उभी होती, म्हणून तिच्याशी बोलायला मी आत शिरले की चौकशी करावी , तर ती म्हणे, ‘आम्ही इथे फक्त टॉयलेट साठी आलोय’, इथे राहत नाही. त्यांचा उरका पडल्यावर मग आम्ही पण तिथेच नंबर लावला, भरपूर पाणी आणि स्वच्छ टॉयलेट होते. देवाने एकदम रॉयल व्यवस्था केली आमची. Adult diaper वापरावे का की काय करावे ह्या विचारात होतो तर देवाने कोणतीच कसर सोडली नाही.

आता परत किनाऱ्यावर आलो, तर गंगा स्नानासाठी बोटी सुरू झालेल्या . संगमाच्या मध्यात नेऊन स्नान .. मग आम्ही नुसते तरी जाऊ म्हणून गेलो. संगमात नुसते प्रोक्षण केले. अगदी छान वाटली बोट ट्रिप. तिथेच एक जण होती, २५ शी मधलीच असेल , ती म्हणाली, ” कितना अच्छा लग रहा हैं, सब लोग बस एकही सोच रहे है, ऐसा लगता हैं की सब एकही माँ के बच्चे हैं ” ..इतक्या साध्या शब्दात तिने तिथल्या वातावरणाचे यथार्थ वर्णन केले. Vibes का काय ते !!

सूर्योदय बोटीतून पाहिला, परत आलो तर 8-30 होत आलेले. मग एक रामकथा 9-30 ला सुरू होणार होती, तिथ गेलो. वाटेत जाताना आखाडे बघत गेलो, तिथे 2 तास बसलो आणि साधारण 11 ला परत गाडीकडे आलो आणि वाराणसीकडे निघू असे सांगितले फक्त जेवणाचा वेळ सोडला तरी जवळपास वाट काढत वाराणसीत यायला 4 वाजले. तिथे गेलो तर तिथे खूप जास्त ट्रॅफिक, त्यात बुक केलेले हॉटेल जरा आत गल्लीमध्ये. मग गाडी सोडली, चालत हॉटेलवर पोचलो. लगेच ड्रेस change करून गंगा आरतीला गेलो. बोट ride, गंगा आरती सगळं छान झालं..

एकाने अर्ध्या तासात दर्शन करवतो म्हणून गळी उतरवले आणि मी फसले. त्याच्या मागे गेलो. दर्शन होईस्तो 10-15 झाले रात्रीचे !

आधीच्या रात्री अवनीश exam म्हणून लवकर उठलेले, मग संगमावर गाडीत जेमतेम अडीच तीन तास.. त्यामुळे सकाळी 4-30 विश्वेश्वर दर्शनला निघायचं प्लॅन कॅन्सल केला. 11-15 पर्यंत पोचलो हॉटेल वर , 12 च्या आसपास झोपलो.

सकाळी परत 4-15 ला जाग !

5-30 ला आवरून हॉटेल बाहेर आलो तर लगेच समोर रिक्षा. मग संकटमोचन हनुमानला गेलो, झक्कास दर्शन झाले , फार गर्दी नव्हती.

तिथून अस्सी घाटला सूर्योदय बघितला. आदल्या दिवशी आरती घ्यायला  मिळाली नव्हती , ती इथे मिळाली. तिथून मग कालभैरवला आलो, 8-30 च्या आसपास तेही झाले. मग विशालाक्षीचे दर्शन घ्यायचे ठरवले.

वाटेत वाराणसीच्या गल्ल्या मधून फिरलो, मग राम मिठाई भांडार लागले, तिथे फेमस कचोरी जिलेबीचा नाश्ता केला. मग भरपूर चालत गल्ली बोळ फिरत  विशालाक्षीला आलो. वाटेत बघितलं आज विश्वेश्वराला भूतो न भविष्यती गर्दी होती. मोठ्या line लागल्या होत्या .त्यामुळे मधल्या छोट्या गल्ल्या बंद केलेल्या .. 

आदल्या दिवशी दर्शन घेतले ते अगदी योग्य झालेले !

शक्ती पीठ असलेल्या विशालाक्षीचे दर्शन घेतले. मंदिर दक्षिणी पध्द्तीचे आहे पण खूप शांत वाटले. तिथली ऊर्जा जाणवत होती. 

मग मात्र लगेच हॉटेल वर आलो. फ्रेश झालो व टॅक्सी बुक केली. ट्रॅफिकमुळे टॅक्सीवाल्याने मेन रोडपर्यंत म्हणजे जवळपास 2 किमी चालत यायला suggest केले , जे आम्ही मान्य केले कारण गाड्या हालतच नव्हत्या , थांबून राहिलो तर आमचीच flight मिस झाली असती. 

चालत गेल्यावर लक्षात आले आमच्याकडे 1 तास हातात आहे. मग वाटेत सारनाथला जाऊ ठरले.

तिथे गेल्यावर बरीच निराशाच झाली. एवढी सुंदर मंदिरे, त्यावरचे कोरीव काम आपल्या सनातनी मंदिरांची असताना आमच्या लहानपणी कधीही अभ्यासात त्याबद्दल शिकवले गेले नाही आणि ह्या सारनाथबद्दल मात्र मलाच नव्हे तर माझ्या लेकीच्या अभ्यासात पण अजून त्याबद्दल माहिती आहे. पण काशीबद्दल नाही हे लक्षात आल्यावर चिडचिड झाली. असो .

परमेश्वराचीच इच्छा , त्याला जेव्हा प्रकट व्हायचे असेल तेव्हा तो नक्की होईलच फक्त आपला तो विश्वास कायम हवा. 

एक मात्र नक्की …. 

होतं  ते बऱ्यासाठीच हा माझा विश्वास ह्या ट्रिपनंतर नक्कीच बळावला..

लेखिका : सौ. प्राची सहस्रबुद्धे – वेलणकर

प्रस्तुती : सौ.  उज्ज्वला सहस्रबुद्धे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काडी काडीचे घरटे… – लेखक : मुसाफिर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ काडी काडीचे घरटे… – लेखक : मुसाफिर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

मधुचंद्राहून ठाण्याला घरी आल्यावरची पहिली रात्र… नाही नाही. ‘ती’वाली रात्र नव्हे. त्या रात्रीचा पहिला स्वयंपाक, शेजारच्या शेगडीवर कुकर फुसफुसत होता.(कोकणस्थ) गोड-आमटी करायची गोड जबाबदारी माझ्यावर होती.

मी गॅस लावायला काडेपेटी हातात घेतली मात्र. माझ्या पाठीवर एक स्पर्श झाला. मी लाजून चूर. मनाने कायशिशी मोहरून गेले. अजूनही आमचा माफक रोमान्स चालू होता ना.

माझे गाल लाल व्हायला लागले, सॉरी मी गोरी नाही. सबब माझे गाल चॉकलेटी व्हायला लागले.

तिरपा कटाक्ष टाकून मागे बघते तो साक्षात सासु माँ.. शेजारी गॅस चालू आहे ना मग नवीन काडी कशाला पेटवली ? त्या काडीने माझ्या रोमान्सची झिंग क्षणात काडीमोल होऊन मी भानावर आले. सासूमाँनी मला दुसरी काडेपेटी दाखवली,

ज्यात जळलेल्या काड्या होत्या एक शेगडी पेटलेली असेल तर नवीन काडी लावायची नाही. जळलेल्या जुन्याकाडीनेच पेटलेल्या शेगडीवरून विस्तव उचलायचा. आता कुकरचा अती प्रशस्त-ओबेस देह शेगडीवर तापलेला असताना, त्याखालून जुन्याकाडीने विस्तव कसा पळवावा ? 

मग सांडशीच्या तोंडात जुनी काडी.. आणि तो पलीता कुकरच्या कुल्ल्या खाली अशी कसरत झाली. अखेर आमटीखाली गॅस लागला.तो पर्यंत मी गॅसवर होते कारण कर-कटेवरी घेऊन सासु माँ माझ्या प्रत्येक कृतीकडे डोळे बारीक करून बघत होत्या. 

दुसऱ्या दिवशी फुरसतीत सासुमांनी मला उभे उभे तुकडे केलेली जुनी पिवळी-पोस्टकार्ड दाखवली. त्या लांब लांब – तुकड्यांनी ह्या शेगडीवरून त्या शेगडीवरचा अग्नी प्रज्वलित करायला सोप्पा कसा पडतो त्याचं प्रात्यक्षिक दाखवल.

हे बघ प्रत्येकवेळी नवीन काडी लावायची नाही. आम्ही काडी-काडी जोडून वाचवलेल आहे, तेव्हा कुठे हे आजचे दिवस दिसतायत. आज मनात येत, नवीन पिढीची सून असती तर त्या एका न पेटवलेल्या काडीने तिने एव्हाना काडीमोड सुद्धा घेतला असता.

सासूमांची काडी-काडी कॉन्सेप्ट स्वयंपाकघरातच नव्हे तर घरभर वावरत असे. प्रत्येक वस्तू वापरताना आणि जुनी होऊन टाकताना त्यांची परमिशन लागे. अगदी अंतर्वस्त्रसुद्धा त्यातून सुटली नव्हती.चिंधीवाली कडे अंतर्वस्त्र विकली जातात हा ज्ञान साक्षात्कार मला त्यांनीच घडवला.

जुने परकर, ब्लाऊझ, साड्या वगैरे मंडळींची रवानगी, कपाटातून स्वयंपाकघरात होत असे. घासलेली भांडी पुसून जागच्या जागी ठेवायला,हात पुसायला आणि स्वयंपाकघरातला कार्यभाग संपला की त्यांचे deputation पाय पुसणे म्हणून होत असे.

आंघोळीच्या गरम पाण्यात रवी व ताकाचं भांडं धुणे. दुधाच्या पिशव्या धुवून वाळवून विकणे.दुधाच्या कोरड्या पिशव्यांनी तर आमच्या घरात इतिहास घडवला होता. त्या पिशवीने काय काय पाहिलं नव्हतं ? त्यात सासु माँ च्या प्रभातफेरीतील पुष्पचौर्य – रहस्यमयी कथा लपलेल्या असत.

जास्वंदीच्या अन मोग-याच्या टप्पोऱ्या कळीचा उमलण्यापूर्वीचा कळीदार प्रवास त्या पिशवीतून होत असे. त्यातच देवळातल्या मैत्रिणींना वाटण्यासाठी तिळगुळ असत.दशभुजा गणपतीच्या देवळातून संकष्टीच्या प्रसादाचे मोदक त्या दूध पिशवीच्या पालखीतूनच घरी येत. हनुमान जन्मोत्सवाचा सुंठवडा त्यातूनच येई आणि रामा- शिवा- गोविंदा ह्या मानक-यांचे प्रसाद सुद्धा कधी चैत्र तर कधी श्रावण महिना साधून, त्या पिशवीतून आमच्या घरी येत.

त्यात कधी सुट्टी नाणी विराजमान होत तर एखादी फाटलेली पण खपावयची असलेली दहा रुपयांची नोट ही असे. कहर म्हणजे एकदा तर बँकेच्या लॉकरमधले किडुक-मिडुक सासु मां नी त्या पिशवीतून घरी आणल्यावर मात्र मी त्यांना कोपऱ्यापासून हात जोडले होते.

जी गत दुधाच्या पिशवीची तीच इतर वस्तूंची.

आणि केवळ सासुमाँच नव्हे तर तिच्या पिढीने हाच पुनर्वापर-मंत्र जपला. दिवाळीच्या वेळी वापरलेल्या मातीच्या पणत्या स्वच्छ पुसून माळ्यावरती चढत. तीच कथा कंदील किंवा चांदणीची असे.तीच कथा मोती साबणाची असे एक मोतीसाबण सलग सहा वर्ष वापरलाय आहात कूठे दिवाळी भाऊबीज झाली की मोतीसाबण सूकवून परत खोक्यात भरून ठेवणीच्या कपाटात. इस्त्रीची एकदा वापरलेली साडी त्याच घडिवर घडी पाडून कपाटात जायची आणि अर्थातच पुन्हा नेसली जायची. अश्या कित्येक गोष्टी.

चहाच्या कानतुटक्या-अँटिक-कपमध्ये वाटलेली हिरवी चटणी ठेवणे, क्वचित तो कप विरजणासाठी वापरणे त्याच क्रोकरी सेटच्या (?) विजोड झालेल्या बश्या झाकण म्हणून वापरणे. तुटक्या प्लास्टिक बादल्यामध्ये झाडे लावणे. रिकाम्या डालडा-डब्यात तुळस लावण्याचे सत्कार्य ज्या कुणी सर्वप्रथम केले असेल त्याला काटकसर आणि पर्यावरण प्रेमाचे एकत्र नोबेल कां बर देऊ नये ?

पूर्ण वापर झाल्याशिवाय फेकणे ह्या गुन्ह्याला त्या सर्वांच्याच राज्यात क्षमा नव्हती. फ्रीजमधे हौसेने आणून ठेवलेल्या आणि न वापरून एक्सपायरी डेटलेल्या सरबताच्या, व्हिनेगरच्या बाटल्या टाकायला काढल्या की सासु मां चा तिळपापड होत असे. वापरायची नव्हती तर आणली कशाला इतकी महागातली बाटली ? आम्ही नाही बाई अश्या वस्तू कधी टाकल्या.

एक्सपायरी डेट नसलेले अमर आयुर्वेदिक काढे त्यांना भारी प्रिय. वस्तूंचा पुनर्वापर हा शब्द कधीही न ऐकता सासू मां नी त्या कल्पनेची अम्मल बजावणी किती तरी वर्षे आधीच केलेली होती. साधे इस्त्रीचे कपडे घरी आले तरी त्या कागदाचा बोळा न होता तो रद्दीच्या गठ्ठ्यात जाई आणि त्याला बांधलेला पांढरा दोरा गुंडाळून एका विशिष्ठ ठिकाणी ठेवलेला असे.

भेटवस्तुचे चकचकीत रंगीत कागद निगुतीने घडी करून ठेवलेले असत. त्यांच्या पिढीने अश्या अनेक प्रकारे कचरा संवर्धन केले. लाकूड, प्लास्टिक, काच आणि कपड्यांचेच नव्हे तर तव्यावरच्या उष्णतेचे सुद्धा रीसायकलिंग केले.पोळ्या झाल्यावर त्या तापलेल्या तव्यावरच फोडणी करणे. फोडणीचे काम नसेल तर क्वचित त्या तव्याचा शेक दुधाच्या पातेल्याला देणे.

वरणभात शिजल्यावर कुकर गरम असतानाचे तळातले पाणी फोडणीची-वाटी, किंवा दह्याची – वाटी वगैरे ओशट भांडी धुवायला वापरणे हे सर्वमान्य होते. भांड्याच्या बिळात लपलेले तूप गरम कुकरात ठेवून पातळ करून ते पोळीला लावणे आणि शेवटी ते भांड घासायला टाकण्यापूर्वी त्यातून हात फिरवून तो ओशटपणा हाता किंवा पायाला चोळणे हे करणारी सासु मां ची पिढी आता राहिली नाही.

काय ती जुनी बोचकी सांभाळून ठेवता तुम्ही ? सगळ फेकून द्या हे वाक्य त्या पिढीला आमच्या पिढीकडून अनेकदा ऐकायला लागलं असेल आणि त्या मंडळींनी ही नव्या संसारात आमच्या वस्तूंची अडगळ नको म्हणून गपचुप ऐकलेही असेल.

आम्हीही शौर्य दाखवून अशी अनेक प्लास्टिकची, कपड्यांची, भांड्यांची, काचेची, कागदाची बोचकी बेमुर्वतखोरपणाने फेकली आहेत. जुन्या वस्तू फेकून देऊन नव्या आणणे ह्याला मुळीच डोकं नाही लागत, लागते ती फक्त मस्ती आणि बेफिकिरी पण वस्तू, तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत वापरायला बुध्दी आणि मन ह्या पलीकडेही जाऊन एक पर्यावरण प्रेम लागत ज्याचा उल्लेख त्या पिढीने कधी केला नसेल पण त्या विचाराचं आचरण मात्र आवर्जून केलं.

ती पिढी जगलीही तशीच आणि गेलीही तशीच शरीराच्या प्रत्येक अवयवाचा पूर्ण वापर करून ते जीर्ण शिर्ण झाल्या शिवाय त्या पिढीतल्या कुणी मरण ही पाहिले नाही. सासु मां सुद्धा अठ्याईंशी वर्षे परिपूर्ण जगून मग गेल्या.

आज निसर्गाचा, सृष्टीचा पोएटिक जस्टिस लावायला बसल तर आमच्या पिढीला आणि आमच्या पुढच्या पिढीला निसर्ग पूर्ण जगून नाहीं देणार. आम्ही न वापरता फेकलेल्या आणि अकाली टाकलेल्या वस्तुंसारखाच आमच्या ही शरीराचा आणि आयुष्याचा ही अकाली शेवट होईल आणि आम्हीच ह्या पृथ्वीतलावर तयार केलेल्या, टाकलेल्या वस्तूंच्या कचऱ्यात विलीन होईल अस वाटत राहात.

लेखक : मुसाफिर …

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

सांगली – ४१६ ४१६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – २७ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – २७ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

अण्णा

कितीतरी वर्षं “आण्णा गद्रे” आमचे भाडेकरू होते. गल्लीतले सगळेजण त्यांना अण्णाच म्हणायचे. त्यांचे प्रथम नाव काय होतं कोण जाणे! त्यांची मुलंही त्यांना आण्णा म्हणायचे म्हणून सगळ्यांचेच ते आण्णा होते. त्यांचा संसार याच घरात फुलला असे म्हणायला काही हरकत नाही. तीन मुली आणि एक मुलगा. एका पाठोपाठ एक मुलीच झाल्या म्हणून आण्णा आणि वहिनी फारच निराश असत. पण तीन मुलींवर नवस सायास करून त्यांंना एक मुलगा झाला आणि आण्णांचा वंश तरला. वहिनी म्हणजे अण्णांची पत्नी. अण्णांचे एक भाऊ आमच्याच गल्लीत राहायचे. ते “वहिनी” म्हणून हाक मारायचे म्हणून त्याही समस्त गल्लीच्या वहिनीच.

कोकणातून आलेलं हे दाम्पत्य. ब्राह्मण वर्णीय. जातीय श्रेष्ठत्वाची भावना पक्की मुरलेली. दोघांच्याही स्वभावात चढ-उतार होते. चांगलेही वाईटही पण धोबी गल्लीवासीयांनी सगळ्यांना सामावून घेतलेलं. नाती बनायची नाती बिघडायची पण नाती कधी तुटली नाहीत. आमच्या कुटुंबाचा आण्णा- वहिनींशी सलोखा नसला तरी वैर नक्कीच नव्हतं. म्हणजे मालक भाडेकरू मधल्या सर्वसाधारण कुरबुरी चालायच्याच पण प्रश्न आपापसात सामंजस्याने सोडवले ही जायचे. शिवाय त्यांच्या विजू, लता, रेखा या मुली तर आमच्या सवंगडी समूहात होत्याच.

अण्णा शिस्तप्रिय होते म्हणण्यापेक्षा तापट आणि हेकेखोर होते. कुटुंब प्रमुखाचा वर्चस्वपणा त्यांच्या अंगा अंगात भिनलेला होता त्यामुळे विजू लता रेखा या सदैव धाकात असत.

अगदी उनाड नव्हतो आम्ही… पण मनात येईल तेव्हा, केव्हाही, कुठल्याही खेळासाठी आम्ही एकत्र जमायचो. खेळणं भारी प्रिय. खेळतानाचा आरडाओरडा, गोंधळ, हल्लाबोल मुक्तपणे चालायचा, गल्लीत घुमायचा. अण्णा घरात आहेत म्हणून विजू लता रेखा उंबरठ्यातूनच आमची खेळ मस्ती बघायच्या. त्यांचे खट्टू झालेले चेहरे मला आजही आठवतात. बाहेर आमचा खेळ चालायचा आणि या उंबरठ्यावर बसून गृहपाठ पूर्ण करायच्या नव्हे गृहपाठ पूर्ण करण्याचा प्रयत्न करायच्या. का तर? अण्णा ओरडतील म्हणून. त्यांच्या घरात मुलांना सरळ करण्यासाठी वेताची छडी होती म्हणे! 

एक दिवस आण्णा आमच्या पप्पांना म्हणाले होते, ” का हो ढगेसाहेब? मी ब्राह्मण ना मग ही सरस्वती तुम्हाला का म्हणून प्रसन्न?”

तेव्हा पप्पा उत्तरले होते, ” अण्णा ती वेताची छडी बंबात टाका मग बघा काय फरक पडतो ते. ”

अण्णांचं कुटुंब विस्तारलं. मुलं मोठी झाली आता त्यांना हे भाड्याचं घर पुरेनासं झालं. आण्णांचे जोडधंदे ही चांगले तेजीत होते. त्यांची वखार होती. आणि त्या माध्यमातून त्यांनी भरपूर पैसा जोडला होता. वृत्ती कंजूष आणि संग्रही त्यामुळे गंगाजळी भरपूर. आण्णांनी धोबी गल्ली पासून काही अंतरावर असलेल्या चरई या भागात प्लॉट घेऊन चांगलं दुमजली घर बांधलं. घराची वास्तुशांती केली आणि एक दिवस गद्रे कुटुंबाने धोबी गल्लीचा निरोप घेतला. मात्र त्यांनी आमच्या घराचा ताबा मात्र सोडला नाही.

काही दिवस जाऊ दिले. त्या दरम्यान आण्णा रोज त्यांच्या या जुन्या घरी येत. झाडलोट करत, पाणी भरून ठेवत. बऱ्याच वेळा दुपारच्या वामकुक्षीच्या निमित्ताने ते येतही असत. वखारीच्या हिशोबाच्या वह्या वगैरे तपासत बसत आणि फारसं कुणाशी न बोलता गुपचूपच पुन्हा कडी कुलूप लावून निघून जात. भाडं मात्र नियमित देत.

जीजी (माझी आजी) मात्र फार हैराण झाली होती. ती बऱ्याच वेळा आण्णांना गाठून शक्य तितक्या उंच आवाजात सांगायची, ” आमच्या घराचा ताबा सोडा. आणि व्यवहार मिटवून टाका. बांधलंत ना आता मोठं घर? जरूर काय तुम्हाला हे घर ताब्यात ठेवायचे आणि माझ्या जनाच्याही मुली आता मोठ्या झाल्यात. आम्हालाही आता घर पुरत नाही. अण्णा नुसतंच हसायचे. निर्णयाचं काहीच बोलायचं नाही.

“सोडतो ना आजी. एवढी काय घाई आहे तुम्हाला ?”

त्यावेळी भाडेकरूंचे कायदे अजबच होते. आपलं स्वतःचं घर असूनही भाडेकरूनकडून ते रिकामं करून घेणे हे अत्यंत तापदायक काम होतं. कायदा हा भाडेकरूधार्जिणा होता. असे म्हणायला हरकत नाही. आतासारखे मालक आणि टेनंट मध्ये ११ महिन्याचा करार, कायदेशीर रजिस्ट्रेशन, इच्छा असेल तर कराराचे नूतनीकरण वगैरे मालकांसाठी असलेले संरक्षक कायदे तेव्हा नव्हते. शिवाय भाडोत्री जर अनेक वर्षं तिथे राहत असेल तर ती जागा त्याच्या मालकीची होऊ शकते अशी एक भीती कायद्याअंतर्गत होती पण पप्पांच्या वकील मित्रांनी त्यांना चांगला सल्ला दिला होता.

“हे बघ! त्या गद्र्यांनी घर बांधले आहे. आता त्यांच्या मालकीची स्वतःची जागा आहे. शिवाय तुझी गरज आणि तुझे घर ही दोन कारणे तुला न्याय मिळवून देण्यासाठी पुरेशी आहेत. तुझी बाजू सत्याची आहे. आपण गद्रेंवर केस करूया, तशी नोटीस त्याला पाठवूया”

“शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. ” असा काळ होता तो! पण आमच्या कुटुंबाचा नाईलाज होता.

तर ही कायद्याची लढाई लढायला हवी. साम दाम दंड भेद या तत्त्वातील ही शेवटची पायरी होती. भेद.

घर रिकामं करायची नोटीस आण्णांना गेली. गरम कढईत उडणाऱ्या चण्यासारखे अण्णा टणटण उडले त्यांनी नोटीसीला गरमागरम उत्तर दिले.

“नोटीस देता काय ?एवढ्या वर्षांचे आपले संबंध? थांबाच आता.. बघतोच घर कसे काय खाली करतो ते!” पप्पा कधीच कचखाऊ नव्हते. डगमगणारे तर मुळीच नव्हते.

केस कोर्टात उभी राहिली. आता नातं बदललं. आरोपी आणि फिर्यादीचे नाते निर्माण झाले. आमचं कुटुंब तसं लहानच. माणूसबळ कमी. स्वतःच्या व्यवसायाचा ताप सांभाळून कोर्टाच्या तारखा पाळताना पप्पांची एकट्यांची खूप दमछाक व्हायची.

केस खूप दिवस, खूप महिने चालली. तारखावर तारखा पडायच्या. निकाल लागतच नव्हता. हळूहळू अण्णांना आणि पप्पांनाही कोर्टाच्या वातावरणाची सवय झाली असेल. शिवाय पप्पा म्हणजे माणसं जोडणारे. नावाचा पुकारा होईपर्यंत कोर्टात नियमितपणे येणारी माणसं पप्पांची दोस्त मंडळीत झाली जणू काही. विविध लोकांच्या विविध समस्या पण पप्पा गमती, विनोद सांगायचे. त्यांच्या उपस्थितीत वातावरण हलकं व्हायचं आणि आश्चर्य म्हणजे या समूहात आण्णाही आनंदाने सामील असायचे. न्यायपीठापुढे आरोपी आणि फिर्यादी आणि बाहेर फक्त वक्ता आणि श्रोता. कधीकधी तर कोर्टाच्या बाहेर अण्णा आणि पप्पांच्या गप्पाच चालायच्या. खूप वेळा आण्णा माथ्यावरची शेंडी गुंडाळत, टकलावरून हात फिरवत. डोळ्यात पाणी आणून त्यांच्या कौटुंबिक समस्या सांगत आणि पप्पा त्यांच्या पद्धतीने त्यांचे सांत्वनही करत.

घरी आल्यानंतर आम्ही सारे पप्पांभोवती कडे करायचो. “केस चे काय झाले? निकाल लागला का? कुणाच्या बाजूने लागला ?वगैरे आमचे प्रश्नांवर प्रश्न असायचे आणि पप्पा म्हणायचे, ” हे बघा अण्णांनी डबा भरून खरवस आणला होता. मी खाल्लाय तुम्ही खा. मस्त झालाय खरवस.. ”

याला काय म्हणायचे ?

आज हे लिहिताना माझ्या मनात सहजच आलं. अण्णांनी दिलेला खरवस पप्पांनी कशाला खावा? अण्णांनी त्यांच्यावर विषप्रयोग वगैरे केला असता तर? टीव्हीवरच्या माणूसकी शून्य मालिका बघून झालेली ही मानसिकता असेल पण त्या वेळचा काळ इतका वाईट नक्कीच नव्हता. माणूस काणूस नव्हता झाला.

यथावकाश केसचा निकाल लागला. पपा केस जिंकले, अण्णा हरले. कोर्टाच्या आदेशानुसार अण्णांना तात्काळ घर रिकामे करून द्यावे लागणार होते.

दुसर्‍याच दिवशी आण्णा घराची चावी द्यायला आले. थोडा वेळ आमच्यात बसले. गप्पा -गोष्टी, चहा -पाणी झाले. पपानीही नवे कुलूप आणले होते. दोघेही खाली गेले. आम्ही खिडकीतूनच पाहत होतो. गल्लीतले सर्व आपापल्या गॅलरीतून पाहत होते. बाबा मुल्हेरकर मात्र खाली आले होते. दोघांच्याही सोबत ते उभे होते. आण्णांनी त्यांचे कुलूप काढले आणि पप्पांनी आपले लावले. विषय संपला. कोणीच कोणाचे वैरी नव्हते. “केस” संपली होती. मैत्र उरले होते.

आण्णा दोन पावले चालून गेले आणि माघारी फिरले. आम्हाला वाटले, ” आता काय?”

अण्णांनी घराच्या दोन पायऱ्या चढून दाराला पप्पांनी लावलेले कुलूप ओढून पाहिले. नीट लावले होते आणि त्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. त्याच्या खांद्यावर पपांनी हात ठेवला. तेव्हा ते म्हणाले, ” ढगे साहेब! या वास्तूचं खूप देणं लागतो मी. इथेच माझा संसार बहरला. आयुष्य फुललं. तुमच्यासारखी जीवाला जीव देणारी माणसं भेटली. माझा कुलदीपक इथेच जन्मला. या वास्तूचा निरोप घेताना माझं मन खूप जड झाले आहे हो ! पाऊल उचलत नाहीय. ”

हिरव्यागार डोळ्यांचा, डोक्यावर टक्कल असलेला, बोलण्यात अस्सल कोकणी तुसडेपणा असलेल्या या तापट, हेकट माणसाच्या अंतःप्रवाहात हा भावनेचा झरा कुठून उत्पन्न झाला असेल?

“याला उत्तर आहे का?”

“नाही” 

याला फक्त जीवन ऐसे नाव… 

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆  विचारायला काय जातं ?… – लेखिका : सुश्री स्नेहल अखिला अन्वित ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

सौ. बिल्वा शुभम् अकोलकर

? मनमंजुषेतून ?

☆ विचारायला काय जातं ?… – लेखिका : सुश्री स्नेहल अखिला अन्वित ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

मागे बऱ्याच वर्षांपूर्वी टाटा स्कायच्या खूपच छान जाहिराती आल्या होत्या. काही जाहिराती खरच इतक्या नेमकेपणाने बनवलेल्या असतात की डायरेक्ट दिलातच घुसतात. त्यातल्या दोन माझ्या फारच आवडीच्या होत्या.

मिलिटरी परेड चाललेली असते, दोन मित्र इतरांप्रमाणेच ती परेड बघत असतात; त्यातल्या एकाला त्या परेड मधल्या मिलिटरी टँक मध्ये बसायची हुक्की येते, तो दुसऱ्याला मस्का मारत असतो विचार ना विचार ना…….. त्याचा मित्र त्याला हुर्रss करत उडवून लावतो.

आता त्या टँक मध्ये बसणं सोडा बाजूला तरी कोणी उभं राहू देईल का?

पण नाही………

त्याला आपली इच्छा मारणं अजिबात उचित वाटत नाही, तो म्हणतो बघूया विचारून आणि तो मग त्या उग्र चेहऱ्याच्या गाडीवानाला विचारतो,

Unclji, can I get a lift till Victoria hotel?

दुसऱ्या मित्राला वाटतं, झालं पडणार आता याला!

तो गाडीवान देखील याच्याकडे अचंबित नजरेने पाहतो आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसताना त्याला लिफ्ट द्यायला राजी होतो!

अन् मग तो आश्चर्याचा झटका कॅच करणाऱ्या म्युझिक सकट टॅग लाईन येते……..

पुछने मे क्या ज्याता है??

दुसरी ही अशीच भारी. ……..

नवरा एका गेटटूगेदरला जाण्यासाठी एकटाच निघत असतो आणि बाईसाहेबांच्या मनात येत एवढं छान वातावरण आहे तर पाच मिनिटं का होईना मस्तपैकी बाहेर चक्कर मारायला जावं. बया नवऱ्याला विचारतेही लगेच, तो म्हणतो ठिक आहेस ना? इथे दहा मिनिटात मला गेटटूगेदरला पोचायचयं आणि तुझं काय भलतंच? पंचवीस वर्षांपासून ओळखतेस मला मी कधी लेट पोचलोय कुठे?

पण नंतर मात्र कशी कोण जाणे बायकोची इच्छा त्याला पूर्ण करावीशी वाटते आणि तो तिला चक्क ड्राईव्ह वर नेतो…

नवरा यावेळी नेणं शक्य नाही हे माहीत असूनही ती मनाला त्या क्षणी वाटलं ते बोलते आणि फारशी अपेक्षा नसतानाही तिची इच्छा पूर्ण होते सुद्धा!

सही ना?

तुम्ही आहात का या येड्यांमधले! काही का असेना भला पुछने मे क्या ज्याता है म्हणणारे ? मी तर आहे बाबा!

खरंच काय जातं विचारायला?

काय जातं आपल्या इच्छा बोलून दाखवायला?

जात काहीच नाही, पण प्रत्येक ठिकाणी आपला संकोच आड येतो.

बघा जरा यावरही विचार करून……….

किती जणी बेधडक आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवतात सांगा?

बहुतेकदा मन मारूनच जगतात, ह्याला- त्याला काय वाटेल याचा विचार करत कुढतच बसतात. घरी कामाचा ढिगारा एकटा उपसतील, पण समोर नवरा रिकामा असेल; त्याला मदतीला बोलवावंही वाटत असेल; पण येईल का तो, असं कसं विचारायचं उगाच? जाऊ दे तिकडं! करत बसतील.

पण कधीतरी सांगूनही बघा की, तुम्हालाही गोड सरप्राईज मिळू शकतं, नाही येत कधी काही गोष्टी घरच्यांच्या लक्षात, म्हणून आपण आणून दिल्या तर चालतं, कोणाला माझी कदरच नाही करत रडण्यापेक्षा फार फार बरं!

या पुछने मे क्या ज्याता है चे रिझल्ट मला तर नेहमीच पॉझिटिव्ह मिळालेत ……

एकदा रात्री साडे अकरा वाजता घरातली चहा पावडर संपलीये, हे मला आठवलं. अन् तेव्हा मुलीची सकाळची शाळा होती, चहा तिच्यासाठी मस्ट होता. किराणा मालाची दुकान एव्हाना बंद झालेली होती. मी नवऱ्याला सांगितलं तर त्याने आता सगळं बंद झालं म्हणून मला वेड्यात काढलं. मी तरी त्याला जबरदस्तीने बाहेर काढलं.

म्हटलं चल पाहू तरी! 

एक मेडिकल जागं दिसलं. मी नवऱ्याला म्हणाले, विचारून बघूया ना!

तो म्हणाला, ठीक आहेस ना? मेडिकल मध्ये चहा कोण ठेवत का? जा तूच विचार, मी नाही येणार मुर्खपणा करायला!

मला पण कसंतरी वाटत होतं खरं, पण अगदी गरजच म्हणून मी मेडिकल मध्ये तोंड वर करून विचारुन बघितलं आणि फॉर माय सरप्राईज दहा रुपयाचं चहाचं पाकीट त्याने चक्क माझ्या हातात ठेवलं, अक्षरशः तिथल्या तिथे नाचत मी ते नवऱ्याला दाखवलं!

देखा? पुछनेमे क्या ज्याता है?

आपण आपलेच आराखडे बांधतो आणि त्याला धरूनच चालतो, काहीही म्हणा नकारघंटा वाजवायला जरा जास्तच आवडते आपल्याला.

एखाद्या मोठ्या दुकानात भाव करायला आपल्याला लाज वाटते, भाजीवाल्याकडे पुलाव मध्ये घालण्यासाठी फक्त चार फरसबी लागणार असतात, आपण पाव किलो घेतो (घरी भाजी आवडत नसली तरी) चार देईल का म्हणून, नॉनस्टॉप गाडी आपल्या गावावरून जाते, पण आपण दोन मिनीटं थांबवाल का विचारतच नाही, गप गुमान पुढे उतरुन मागे येतो.

खूप गोष्टी आहेत अशा ज्या आपण न विचारता सोडून देतो, आणि मन मारून जगत राहतो.

एकदा फक्त एकदा बोलून बघायला हवंच, नकोच ती रुखरुख मागे……

काय होणारे होऊन होऊन?

तसं तर आपण विनाकारण बरच बडबडत असतो पण जिथे बोलायचं तिथेच तोंड दाबून बसतो.

होणार नाही, मिळणार नाही वाटणारी unusual demand फक्त मनात न ठेवता विचारून, बोलून मला तरी खूप वेळा मिळालीये!

खरंतर हिच अनोखी डिमांड जेव्हा आश्चर्यकारक रित्या पूर्ण होते, तेव्हा तर एक वेगळीच मजा अनुभवायला मिळते.

तर आता, आपण मनात उचंबळून येणाऱ्या लहरींचा गळा घोटण्याआधी थोsssडं थांबायचं आणि फिल्मी स्टाईलमध्ये स्वतःशीच (मनातल्या मनात) बोलायचं!

चलो पुछ ही लेतें है, आखिर पुछने मे क्या ज्याता है?

पूछ डाला तो लाईफ झिंगालाला…..

हे मी नाही ते ऍडवाले म्हणतात बरं का..

तुम्ही त्या टाटा स्कायवाल्या ऍड नक्की बघाच हं यूट्यूबवर “puchneme kya jata hai” टाईप करा आणि पाच-सहा मस्त ऍड एन्जॉय करा……..

त्यांचा होऱ्या कायम लक्षात ठेवून आपली लाईफ झिंगालाला करायला मुळ्ळीच विसरू नका !

लेखिका : सुश्री स्नेहल अखिला अन्वित

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मदतीचा त्रास… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ मदतीचा त्रास… ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

विशु आमची जवळची मैत्रीण.

स्वभावाने लाख, हुशार आणि मदतीस अगदी तत्पर.

गम्मत अशी, की विशूचा मनुष्य संग्रह अत्यंत मोठा… कोणतेही काम सांगा, हिच्याकडे त्यावर उत्तर तयार असते… बरं, यात तिला मोठेपणाही नको असतो… पण मदत करण्याची भारी हौस— 

हसू येईल सांगितले तर,.. पण हिच्या मदतीचा लोकांना त्रास होतो.

कसे म्हणताय?…… ऐका तर.

लेकाचे लग्न विशूने हौसेने केले. सूनबाईना वेगळा फ्लॅट आधीच घेऊन ठेवला होता. सूनबाई घरी प्रवेश करायच्या आधीच, विशूने, आपल्या हौसेने घर अगदी मस्त लावून टाकले.

सूनबाईने बघितले, आणि म्हणाली, “ मला हा नको होता फ्रीज. आणि मला हा रंग नाही आवडत भिंतींना. मला तरी विचारायचे ना आधी. ” 

…. झाले. एवढा खर्च, कष्ट करूनही दोघीही नाराजच.

तरी विशूची जित्याची खोड जात नाही. ती इतकी भाबडी आहे ना, की, समोरचा रागावूही शकत नाही.

सहज वीणा म्हणाली, “ बाई ग परवा केळवण करणार आहे, १0 माणसे यायची आहेत. , काही सुचत नाही बघ, काय मेनू करू, आणि कसे करू. ” 

विशूने तिला न विचारता, तिच्या समोरच एका बाईना फोन केला, आणि मेनूही सांगून मोकळी झाली.

वीणा म्हणाली, “ अग हे काय,. मी आहे ना इथे, मला विचार की. पैसे मी देणारे ना… आणि तुला कुणी सांगितलं मला बाई हवीय ? मी बघीन काय करायचे ते “.

ते विशूच्या गावीही नव्हते..

हल्ली लोक तिला बोलवेनासे झालेत. आली की सर्व सूत्रे हाती घेतलीच म्हणून समजा. भिडस्त लोकांना हे आवडत नाही पण बोलताही येत नाही.

…. तिलाही फटके कमी नाही बसत.. या स्वभावाचे.

कामवालीच्या उनाड मुलाला हिने नोकरी लावून दिली. ४ दिवसात मालकाचा हिलाच फोन. “ बाई कसला मुलगा दिलात–. गेला की काम सोडून. ” 

हिने विचारले कामवालीला, तर फणकाऱ्याने म्हणाली, “काय व बाई. असली नोकरी देतात व्हय? दुधाच्या पिशव्या टाकायच्या- तर कोण तिसऱ्या तर कोण पाचव्या मजल्यावर राहत्यात. पोराचे पाय दुखले, दिली सोडून नोकरी “.

…. विशू हतबुद्ध झाली.

शेजारच्या मुलीचे लग्न जमता जमत नव्हते. विशूच्या ओळखीचा एक मुलगा होता. हिने लगेच, त्या मुलीला, त्याचे स्थळ सुचवले. दोघे, भेटले, बोलले.

ती मुलगी विशूला म्हणाली, “काकू, कसला मुलगा सुचवलात हो. सगळे एकत्रच राहतात. केवढी माणसे, घरात. आणि त्याला पगारही माझ्यापेक्षा कमी. नका बाई असले मुलगे सुचवू. ”

…. बिचारी विशू.

आनंदी गुणी आहे विशू.

मागच्याच महिन्यात तिच्या नातवाची मुंज होती. मुलगा सून विशूकडे आले. म्हणाले, “ आई, कृपा कर. पण आम्हाला तुझी कोणतीही मदत नकोय. आमचे आम्ही समर्थ आहोत सगळं करायला. तुम्ही दोघे फक्त मुंजीला आणि सगळ्या कार्यक्रमाला या. ”…. थोडक्यात, तू अजिबात लुडबूड करू नकोस ही गर्भित धमकीच होती.

विशूला वाईट वाटलं. आमच्या कट्टयावर हिरमुसून बसलेली विशू बघून इतर मैत्रिणींनी विचारलं,

“काय ग काय झालं? “

विशूने घडलेली हकीगत सांगितली. आमची दुसरी मैत्रीण माया म्हणाली,

“आता तरी शहाणी हो ग बाई. तू चांगल्या भावनेने करायला जातेस पण लोकांना तुझी मदत आवडत नाही.

करू देत ग सून मुलगा हवी तशी मुंज. तू फक्त गप्प बस आणि त्यांच्या आनंदात सहभागी हो. अजिबात लोकांना यापुढे नको असलेली मदत करायची नाही. जमेल का एवढं?”

विशू म्हणाली, “ हो ग. मी हे पथ्य नक्की पाळेन. बघालच तुम्ही. ” 

आश्चर्य म्हणजे आता आमची विशू खरोखर सुधारली. कोणी विचारलं तरी सुद्धा ती हल्ली न मागितलेली मदत करत नाही की सल्ले देत नाही…

… त्यामुळे तिला सुख झाले. विशूची कहाणी सुफळ संपूर्ण झाली.

©  डॉ. ज्योती गोडबोले 

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मरणाची घाई… लेखिका : सौ. विदुला जोगळेकर☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मरणाची घाई… लेखिका : सौ. विदुला जोगळेकर☆ श्री सुनील देशपांडे

फार मरणाची म्हणजे खूप घाई होते हल्ली…

प्रत्येक क्षणावर कशाची तरी मोहर उमटलीच पाहीजे म्हणुन घाई…

क्षण फुकट वाया गेला म्हणुन लगेच गळे काढायची पण घाई…

*

माझ्याजवळ काही आलंय की जे अजुन मलाही नीट नाही उमगलय…

ते पटकन जगाला दाखवायची घाई….

*

जगापर्यंत ते पोहचलंय की नाही हे आजमावायची घाई…

पोहचलं असेल तर त्याचे निकष जाणून घ्यायची घाई….

*

गर्भातल्या श्वासांना डोळे भरुन बघायची घाई….

व्हेंटिलेटरवरच्या श्वासांना निरोप द्यायची घाई….

*

मुखातून पडलेला शब्द अवकाशात विरायच्या आधी पकडायची घाई…

विचारांना अविचाराने बाजुला सारायची घाई….

*

नजरेत दृश्य येताक्षणी कॅमेऱ्यात बंद करायची घाई…

विचाराचा कोंब फुटता क्षणी, कृतीत उतरायची घाई…

*

फळाफुलांना हंगामाआधी पिकवण्याची घाई….

बोन्सायच्या टोपीखाली निसर्ग दडवायची घाई….

*

मे मधला गोडवा जानेवारीतच चाखायची घाई….

बोबड्या बोलांना इंग्रजीत ठासून बसवायची घाई… !

*

चिमखड्या आवाजांना लता /किशोर व्हायची घाई.

बालांना किशोर व्हायची घाई…

किशोरांना यौवनाची चव चाखायची घाई….

*

तर काल उंबरा ओलांडून आलेल्या मुलीला सगळे अधिकार हातात घ्यायची घाई….

तिन्हीसांजेच्या परवच्याला नृत्य / लावणीची घाई…

दिवसभराच्या बुलेटिनला जगाच्या घडामोडी कानावर ओतायची घाई…

*

प्रसंग ऐकताक्षणी शुभेच्छा द्यायची घाई…

श्वास थांबता क्षणी श्रद्धांजली वाहायची सुद्धा घाई… !

*

मुक्कामाला पोहचायची घाई….

*

कामावरुन निघायची घाई…

सिग्नल संपायची घाई….

*

पेट्रोल / डिझेलच्या रांगेतली अस्वस्थ घाई…

सगळंच पटकन उरकायची घाई…

*

आणि स्वातंत्र्यावर थिरकायची घाई…

आठ दिवसांत वजन कमी करायची घाई…

*

महीनाभरात वजन वाढवायची देखील घाई…. !

पाच मीनिटात गोरं व्हायची घाई…

*

पंधरा मिनिटात केस लांब व्हायची घाई…

एक मिनिटात वेदना शमवायची घाई…

*

एनर्जी ड्रिंक पिवून वडीलधाऱ्यानां दमवायची घाई…

साऱ्या या घाईघाईने जीव बिचारा दमुन जाई…

*

भवतालचा काळ / निसर्ग गालात हसत राही….

मिश्कीलपणे माणसाच्या बुद्धीला सलामी देई… !!!

*

घाईघाईने मारलेल्या उड्या

कमी कर रे माणसा थोड्या

बुद्धी पेक्षाही आहे काळ मोठा

कधीतरी जाण वेड्या…

लेखिका : सौ विदुला जोगळेकर.

प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे 

 फोन :९६५७७०९६४०

 ई मेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देह बोलतो… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ देह बोलतो… ☆ सुश्री शीला पतकी 

तुम्हीच तोंड दाबून बसल्यावर बोलणार कोण?.. तुम्ही बोलल्याशिवाय होत नाही म्हणजे बोलणे.. वाचा.. यावर आपल्या भावना व्यक्त होणे अवलंबून आहे या गोष्टीचा विचार केला तेव्हा लक्षात आले फक्त वाचा, वाणी, जीभ हीच बोलण्याची साधने नव्हेत आपले संपूर्ण शरीर खरंतर बोलत असते त्याचीच काही उदाहरणे पाहू….

पाहिलंत का तिच्या कपाळावर आठी चढली लगेच म्हणजे… ना पसंती कपाळावर दाखवता येते. तिने नाक कसे मुरडले पहा… ना पसंती दाखवली !नाक जरा वर ओढून घेतले काय चालले ते पसंत नाही मला! ओठ विलग होऊन किंचित हास्य आले.. आवडले किंवा संमती! हसून हसून बेजार झालो.. आनंद !गाल फुगले.. रुसवा !मान उभी हलली.. होकार !मान या कानापासून त्या कानापर्यंत आडवी हलली.. नकार ! मान किंचित झुकवली, आदर !छाती पुढे काढून चालणे.. रुबाब !ऊर बडवून घेणे.. दुःख !पाठीवर थाप.. प्रोत्साहन! मुठी एकत्र करणे आणि हात उंचावणे.. निश्चय !हात हलवणे निरोप देणे! दोन्ही हात वर घेऊन चालत येणे.. शरणागती! दोन्ही हाताने टाळ्या वाजवणे.. आनंद व्यक्त करणे !अंगठा दाखवणे.. चिडवणे किंवा ध्येय साध्य झाले असे सांगणे! करंगळी दाखवणे…. *मी सांगायला नको) एकमेकांच्या हातावर हात देऊन टाळी देणे.. सहमती दर्शक आनंद !हाताने दंड थोपटून दाखवणे, ताकद किंवा बळ !गुडघ्यावर रांगत येणे… शरणागती !एकच पाय विनाकारण हलवणे.. अस्वस्थता! लाथ मारणे.. रागाचा परिपाक खूप रागावणे !लाथा बुक्क्यांनी मारणे प्रचंड राग!! कमरेत वाकणे… मान देणे !साष्टांग दंडवत.. सन्मानदर्शक भक्तीपूर्वक नमस्कार !आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळे… डोळे बारीक करून पाहणे म्हणजे काय चालले याचा अंदाज घेणे!.. डोळे तिरके करणे.. साशंक !डोळे ओले होणे आनंद किंवा भावूक होणे ! डोळे लाल होणे.. संताप !डोळ्यातून घळाघळा अश्रू येणे.. दुःख !डोळे मिटून घेणे.. शांतता !डोळे वटारणे.. धाक, भीती दाखवणे !डोळ्यात कोणताच भावना न दाखवणे.. निर्वीकारिता! भुवया उंचावणे.. प्रश्नचिन्ह???! गाल लाल होणे.. लाजणे !नजर खाली अंगठ्याने जमीन उकरणे आणि बोटाला पदर गुंडाळणे.. लाजेने भिजून जाणे! चेहरा वेडा वाकडा हातवारे डोळे मोठे.. भांडण!( नळावर याचा अनुभव येतो) मान वर न करणे.. विनय व आज्ञाधारकता !थरथर कापणे.. संताप किंवा भीती! जीभ बाहेर काढून दाखवणे.. वेडावणे! मांडीवर एका हाताने थापटणे.. ये तुला बघतोच म्हणणे !दात विचकून दाखवणे… चिडवणे! दोन्ही हाताने समोरच्याला कवेत घेणे.. प्रेम व्यक्त करणे !पाठ फिरवणे.. ती गोष्ट आवडली नाही हे सांगून तिच्यापासून दूर जाणे.. ! या आणि अशा अनेक घटकांच्या हालचाली मधून आपले संपूर्ण शरीर बोलत असते खर तर आपला देह आपले मन आपले हृदय सारेच बोलत असते पण ती भाषा समोरच्या व्यक्तीशी आपण जितके तादात्म्य पावतो तेवढी त्यालाच कळते एकूण हा भाषेचा थोडासा अभ्यास आपल्यासमोर ठेवला आहे देह बोलतो या सदराखाली आपण विचार करा अजून कदाचित काही गोष्टी सापडतील लेख आणि कल्पना आवडली असेल तर लिहा काहीतरी

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१६ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१६ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

लग्न पहावं करून-

जोगेश्वरी परिसर म्हणजे अगदी मोक्याची जागा. आत्ताचा गजबजलेला लक्ष्मी रोड तेव्हां अस्तित्वातच नव्हता. तो रस्ता नागमोडी आणि कच्चा होता. काही अंतराने फक्त चार-पाच देवळे होती. गणपतीची मिरवणूक, लग्नाची वरात, भिक्षावळ, पालखी श्रीजोगेश्वरी रस्त्यावरून पुढे जायची ही वर्दळीची जागा म्हणून जोगेश्वरी जवळच श्री. शंकर राव कुलकर्णी ह्यांनी गाळा विकत घेतला होता. त्यामुळे छकडा किंवा बैलगाडीतून सायकली दुरुस्त करायला आणायला त्यांना सोईचं पडायच. मंदिरात ओटा आणि दगडी फरशी होती. शुभ कार्य निघाले की जोगेश्वरी परिसरात शिरल्यावर लग्न कार्यवाहक, सगळीच काम करून समाधानाचा निश्वास सोडून अगदी निर्धास्तपणे तिथून बाहेर पडायचे. कारण सगळ्या वस्तू जोगेश्वरी परिसरांतच मिळायच्या. ‘घर पहाव बांधून आणि लग्न पहावं करून ‘ इतकं शुभ कार्य करणे अवघड होत. वधूपिता प्रथम वळायचा पत्रिकेच्या कारखान्यात. शामसिंग रामसिंग परदेशी उत्तम पत्रिका छापायचे. त्यांची इतकी तत्पर सेवा होती की ‘शाम प्रिंटिंग प्रेस’ मध्ये पन्नास हजार पत्रिका तयार असायच्या, सगळा मसुदा एकदम रेडी. श्रीगणेश प्रसन्न. श्रीजोगेश्वरी प्र. वधू वर, वडील मंडळी, वधू-वर पिता सगळे छापलेले रकाने अगदी तयार असायचे. नंतर फक्त नांव विचारून फायनल करून प्रिंट करायची. की झालं काम. चला! महत्वाचं शुभमुहूर्ताचे पहिलं कार्य असं पार पडून पत्रिकांचे गठ्ठे 2 तासात लग्न घरी वेळेवर व्यवस्थित पोहोचायचे. अशा तऱ्हेने कार्याचा पहिला आणि महत्त्वाचा गड, ‘सर’ केला जायचा. काही हौशी पुणेकर पत्रिकेवर वधूवरांचे फोटो छापून घ्यायचे. आत्ताच्या अवजड, भरभरून, डेकोरेट केलेल्या अल्बम पत्रिका, वाचतानाच वाचणारा वाकतो. पण काही म्हणा हं!त्या वेळच्या ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीची सर नाही येणार आत्ताच्या लग्न पत्रिकेला. मंडळी कार्याला वाजंत्री, सनई, चौघडा हवाच हो नां? ती चौकडी पण याच परिसरांत भेटायची. दूध भट्टी गॅस बत्तीवाले, दारू गोळे, भुईनळे वाले आमंत्रणाची वाटच बघत बसलेले असायचे. राजीवडेकरांच्या प्रसिद्ध दुकानात धोतर, कोटटोपी जॅकीट, पगडी घेऊन हौशी पुरुष मंडळी बाहेर पडायची, तर शालूकरांच्या दुकानातून शालू घ्यायला बायका अधिर व्हायच्या. मनासारखा शालू मिळाल्यावर नवरीची कळी खुलायची. देण्या घेण्यासाठी हलकी, भारी नऊवारी निवडायला वडीलधाऱ्या बायका खण आळीकडे लगबगीने वळायच्या. वाटेत अचारी अड्डा लागल्यावर अनुभवी वडीलधारी, मजुरी, मेनू, माणसांची संख्या सारं काही भाव कमी जास्त करून, व्यवहार पक्का करून मोकळी व्हायची. चला! जेवणावळीचं मुख्य काम संपलss. ढोल, ताशा, मिरवणूक, वाजंत्री ई. व्यवहार खुंटा बळकट करून पक्का झाला. आता राह्यला अत्यंत आवडीचा, हौसेचा व्यवहार म्हणजे सोननाणं, दागिने खरेदीचा, त्यावेळी रु. 250 /- तोळा सोन्याचा भाव होता. गरीबा घरचे वधू पिते मणी मंगळसूत्र, जोडवी विरोदी, खरेदी करायचे तर हौशी श्रीमंत वधूपिते लाडक्या लेकीसाठी पेशवाई थाटाचे दागिने सोनाराला काढायला लावून, पसंत करायचे, घोंगडे आळीतल्या घोंगड्यांची पण तेव्हां चलती होती. सगळ्या साईजच्या घोंगड्यांनी शरीराला मस्त उब मिळायची. ज्ञानविलास प्रसिद्ध कारखाना पण इथेचं होता. लग्नात नवरा सायकल, घड्याळ्या साठी आणि भारी शूज करता रुसून बसायला नको, म्हणून ओरिएंटल मध्ये लेटेस्ट बुटाची खरेदी व्हायची. नवी कोरी सायकल घ्यायला कुलकर्णी अँड सन्स तिथे सज्ज होतेच, आणि हो अजुनही आहेत बरं का! मिलन, कला विकास फोटो स्टुडिओ पण सेवेला हजर असायचे. सारं काही श्रीजोगेश्वरीच्या सानिध्यातच, मिळाल्यामुळे वरमायपिता वधूमायपिता धन्य धन्य होऊन मानाच्या कसबा गणपतीला पान सुपारी, अक्षत, विडा, शकुनाचे पांच लाडू आणि पत्रिका द्यायला नटून थटून बाहेर पडायचे.  आणि म्हणायचे ‘गणेशा आमचं कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे रे देवा ‘

– क्रमशः…  

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “अशी पाखरे येती…” ☆ सौ. प्रतिभा कुळकर्णी ☆

सौ. प्रतिभा कुळकर्णी 

??

☆ “अशी पाखरे येती…” सौ. प्रतिभा कुळकर्णी 

खरं तर मला म्हणायचं आहे अशी परदेशी पाखरे येती…..

फ्लेमिंगो पक्षी दरवर्षी हिवाळ्यामध्ये सायबेरिया आणि युरोपातील इतर थंड प्रदेशांमधून काही काळासाठी भारतातील अनेक ठिकाणी येतात. कारण या काळामध्ये त्या देशांपेक्षा भारतातील वातावरण जास्त उबदार असते.

अशीच असंख्य पाखरे दरवर्षी भारतातील आपल्या उबदार कुटुंबात काही काळासाठी येऊन विसावतात. आपल्या कुटुंबातील ही पाखरं आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी दुसऱ्या देशांमध्ये गेलेली असतात. ही पाखरं म्हणजे आपली मुलं आणि मुली.

आज मला हे आठवायचे कारण म्हणजे सकाळी च माझ्या सिंधू ताई चा आलेला फोन. तिला माझी चकल्यांची रेसिपी हवी होती. परवा तिचा लाडका लेक संदीप, सून सारिका आणि नातू सौमिल सह दोन आठवडय़ांसाठी भारतात येणार होता. तसा तो अगदी 

दरवर्षी नाही जमलं तरी २/३ वर्षातून एकदा आपल्या सारिकाआणि सौमिल ला कुटुंबाची ऊब मिळावी म्हणून धडपडत येतोच…..

मग काय… ह्या दिवसात सिंधू ताई कडे “मुलेबाळे येती घरा तोचि दिवाळी दसरा” असेच वातावरण असते.

ही पाखरे इथे Land होण्याच्या आधीच त्यांच्या मिनीटामिनिटाचा कार्यक्रम ठरलेला असतो. पहिले काही तास, फार तर एक दिवस jet lag घालवण्यात जातो. मग त्यांना जास्तीत जास्त सगळ्याच नातेवाईकांना भेटायचं असतं.

शाळा-काॅलेजातील मित्रमंडळींना तर भेटलच पाहिजे याऽऽऽर…. इति संदिप आणि सारिकाही…

मधे च दोघांना ही आठवतात नव्वदी पार केलेल्या कुसुममामी आणि सुशाआज्जी… ह्याना तर भेटलच पाहिजे…. ना जाणो पुढच्या वेळी येऊ तेव्हा……

त्यातच येतात दोन लग्न समारंभ… त्या निमित्ताने सगळे च एकत्र भेटतील…. धम्माल येईल….

अरे पण….

मुंबईत आल्यावर रस्त्यावर उभं राहून गाडीवरचा वडापाव, कांदाभजी खायलाच पाहिजे. आणि भैयाने हाताने कालवलेली तिखट ओली भेळ, झालंच तर मडक्यात हात घालून काढलेली पाणीपुरी व्हायलाच हवी. ताजीताजी गरम जिलेबीने मग तोंडाचा तिखटपणा घालवायचा. हे सारे आधीच ठरलेलं आहे हं…. सौमिलचा हट्ट..

यातलं कांहीही राहिलं तर शेवटच्या दिवशी रात्री २ वाजता विमानात बसताना चुटपुट लागते. “पुढच्या वेळेस नक्की” असं स्वतःचं स्वतःच समाधान करून घ्यायचं……. हे ही ठरल्यासारखेच..

मराठी नाटक हा मराठी माणसाचा weak point. परदेशात मराठी नाटकवाले दौरे करतात. पण इथे येऊन शिवाजी मंदिर अथवा रविंद्र ला नाटक न बघता परत जाणं म्हणजे पंढरीला जाऊन विठोबाचं दर्शन न घेता परत येणं. किंवा शिर्डीला जाऊन साईबांबांचं दर्शन न घेता……

… अरे हो, ह्यावेळी ताईच्या मनात होते सगळ्याना घेऊन शिर्डीला जाऊन यायचे आणि मग तिथून येवला किती लांब राहिलं? सुनेला एक छानशी तिच्या गोर्यापान रंगाला खुलून दिसेलशी

पैठणी घ्यायची. परदेशात असली तरी सारे सणवार अगदी हौसेने करते ती… तेव्हा तीला उपयोगी पडेल ती.

सर्वांनी भारताबाहेरील अनेक देश बघितलेले असतात. पण आपल्या मुलांना ताजमहाल, उदयपूर, जयपूरचे महाल दाखवणं हा अभिमानाचा भाग. किंवा ताडोबा अभयारण्य, जिम काॅर्बेट जमलं तर पर्वणीच. गेला बाजार खंडाळा लोणावळा तर पाहिजेच. हे सगळे संदीप – सायली ने केलेले बेत मनातले मांडे च ठरतात.

काही साध्यासुध्या गोष्टींची खरेदी, जसं बूट, नाईट ड्रेस वगैरे, ही दिवसाचे महत्त्वाचे कार्यक्रम झाल्यावर करण्याची गोष्ट. पण must या यादीतील असते.

मुलांना आवडणा-या पदार्थांची यादी ताई अधूनमधून परत परत बघतच असते. राहिलेले पदार्थ कधी करूया याचं planning ही चालू असतं तीचं. सारिका ला आवडणारा शेपू मिळतंच नाही. संदीप ला आवडणारं माझ्या हातचं वालाचं बिरढं कधी करूया? 

तळलेले बोंबील, चिंबोरीचं कालवण यात सोमवार गुरुवार वगैरे वार आडवे आलेत…. सोम्याच्या आवडीचे अहळीवाचे लाडू आणि भाजाणीची चकली राहिलीच की….. ताई सतत ह्या गहन विचारात…  

आणि एक गोष्ट राहिलीच की. ह्या मुलांना अगदी पूर्ण सक्तीची विश्रांती घ्यायला लावायची. तिकडे अठरा अठरा तास कामात बुडलेली असतात..

पण अजून काही ते साध्य झालेलं नाही…. थोडीशी विश्रांती घेणं…. अर्थात त्यांच्या लेखी ते काही must नसतं. “ते विमानात करू” असं मनानं ठरलवलेलंच असतं त्यांनी… इथल्या प्रत्येक क्षणी आपले आईबाबा आणि बहीण भाऊ यांचा सहवास मिळावा ही सुप्त इच्छा मनात दबलेली/ दडलेली असतेच.

समुला फक्त आजी आजोबा हवे असतात. परदेशी रहात असून ही तो इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषा अस्खलित बोलतो इतकच नव्हे तर त्याने रामरक्षा / अथर्वशीर्ष ही फारच सुंदर म्हटलं….. ह्याचे क्रेडिट मात्र संदिप सारिका च्या संस्कारांना च जातं… इति ताई- भावजी 

हळूहळू परतण्याचा दिवस उजाडतो. दमलेली शरीरं. ताटातुटीच्या कल्पनेने दु:खी मनं.

घरची गाडी असली तरी नेहमीची भाड्याची गाडी ठरवली जाते. कितीला निघायचं ही गणितं होतात. “तासभर लवकरच निघा”. ताई भावोजींचा भरून येणारे डोळे पुसत सल्ला….

मग ती वेळ तो क्षण येतो. डोळे ओले होऊ देणं हल्लीच्या संस्कृतीत बसत नाही. पण मनं व्याकुळ असतात….

“६ महिन्यांनी तुम्ही तिकडे या” “नक्की ” असा करार होऊन गाडी हलते.

पाखरं परत आपल्या अभयारण्यात पोचतात.

तिथलं आणि इथलं चाकोरीतलं जीवन पूर्वीसारख सुरू होतं.

“पुढच्या वर्षी येतील नं तेंव्हा…. ” मनातल्या मनात योजना आकार घेऊ लागतात. आणि मनाला उभारी देऊ लागतात.

वर्षानुवर्षे चाललेलं हे चक्र आणखी एक फेरी घ्यायला सुरूवात करतं.

© सौ. प्रतिभा कुळकर्णी

संपर्क – ६, हीरु नाईक बिल्डिंग, धुलेर, म्हापसा, गोवा – ४०३५०७. मोबाईल – ९९२३१४८९०४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares