मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “लोखंडी काॅट…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “लोखंडी काॅट…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वी एकंदरीत सर्वच समाज साधा मध्यमवर्गीय असा होता. अर्धे अधिक लोकं गरीबच होते. घरं बैठी साधी लहान लहान दोन- तीन खोल्यांची असायची. तेव्हा लोकं आहे त्यात सुखासमाधानात, काटकसरीत राहणारी असायची. घरात दहा-बारा लोकं सहज असायचे. इतके जण असुनही घरात एकचं लोखंडी कपाट असायचे, ज्याला सगळेच ” गोदरेजचे कपाट ” म्हणत असत. त्यात घरातल्यांचे चांगले कपडे ठेवलेले असायचे.

घरातलं सगळ्यांत मुख्य एकमेव फर्निचर म्हणजे… ” लोखंडी कॉट” असायची.

तिचा अनेक प्रकारे उपयोग व्हायचा. त्या कॉटवर एकावर एक गाद्या ठेवलेल्या असायच्या त्या सुद्धा दोन किंवा फारतर.. तीन असायच्या. घरातला कर्ता पुरुष कॉटवर झोपणार हे ठरलेले असायचे. बायका तर कधीच कॉटवर झोपायच्या नाहीत. खाली सतरंजीवरच झोपायच्या.

शर्टाची घडी घालून गादीखाली ठेवली की झाली इस्त्री… कारण तेव्हा क्वचितच कोणाकडे इस्त्री असायची.

काॅटखाली लोकं लोखंडी ट्रंक, लाकडी पेट्या ठेवतं. त्यात कागदपत्रांची एक पेटी असायची. स्वेटर, मफलर, टोप्या अशा कधीतरी लागणाऱ्या गोष्टी ट्र॔केत ठेवत असत.

नेहमी न लागणारं सामान गाठोड्यात बांधून ती गाठोडी पण कॉटखाली ठेवलेली असायची.

आणि खालचा हा सगळा पसारा दिसू नये म्हणून खालची बाजू झाकायला जुन्या साडीचा एखादा पडदा केलेला असायचा.. तो लावलेला असायचा.

चादरी काही ठिकाणी गादीखाली ठेवलेल्या असायच्या. उशा कॉटवर एका बाजूला भिंतीला लागून रचून ठेवलेल्या असायच्या. जरा धक्का लागला की त्या पडायच्याच. … मग आई रागवायची…

प्रत्येक घरी असंच असायचं.. त्यामुळे कोणाला त्याची लाज वाटायची नाही. काही कार्यक्रम असला की घरातली ती काॅट घडी करून ठेवता येत असे. तेव्हा घर एकदम मोठे वाटायचे. ती बाहेर अंगणात ठेवली जायची.

पन्नास वर्षांपूर्वी माझं लग्न झालं तेव्हा पहिली खरेदी म्हणजे यांनी मोठी, भक्कम अशी लोखंडी कॉट घेतली. तेव्हा फार आनंद झाला होता. खूप मोठी खरेदी केली असं वाटत होत. कारण तेव्हा पगार अगदी कमीचं होता. काॅटला कडेला छान गोल असे बार होते. त्याला टेकवून तक्या ठेवला की पाय पसरून आरामात बसता येत असे. दर दोन वर्षांनी हे त्याला रंग देत असत. वापरातल्या वस्तूंची नीट काळजी घेऊन जपून, सांभाळून ठेवायच्या असा नियमच होता. आणि तो बहुतेक वेळा पाळला जायचा.

आमची बदली माढा, उदगीर, उस्मानाबाद, मुरुड, पुणे आणि सांताक्रुज मुंबई येथे होत गेली. या सगळ्या प्रवासात ती कॉट आमच्याबरोबरच होती. डबल बेड घेतले तरी ती कॉट काढायचा विचार कधीच मनात आला नाही. मुंबईला सांताक्रुझला बँकेचे क्वार्टर होते. तिथे वर गच्चीत काॅट ठेवली होती. आम्ही मैत्रिणी काॅटवर बसून गप्पा मारत असू…

हे रिटायर झाल्यानंतर आम्ही पुण्याला आलो. आम्ही तिसऱ्या मजल्यावर राहत होतो. तिथे पण गच्ची होती. मग ती काॅट गच्चीत ठेवली. नातवंडांनी त्या कॉटचा चांगला उपयोग केला. आता रंग द्यायचं काम त्यांच्याकडे होतं. पण दोघं अगदी उत्साहाने दर दोन वर्षांनी कॉटला रंग देत असत. त्यामुळे इतकी वर्ष 

होऊन सुध्दा कॉट अगदी छान होती. आमची डबा पार्टी त्या कॉटवर होत असे. नातू सतरंज्या, गालीचा, ऊशा घेऊन वर जायचा. तक्या ठेवायचा. काॅटवर झोपायला त्याला फार मजा वाटायची.

या काॅटचा पुरेपूर आनंद आम्ही घेतला. आम्ही रहात असलेल्या बिल्डिंगचे री डेव्हलपमेंट होणार म्हणून ती जागा सोडावी लागणार होती.

तेव्हा आता या काॅटच काय करायचे? … हा विचार मनात आला.

तेव्हा अश्विनीला भाचेसुनेला विचारले. कारण त्यांचा बंगला आहे. ती म्हणाली, ” मामी ती कॉट मी नेते “

ती नेते म्हणाली याचा मला फार आनंद झाला. टेम्पो आणुन ती काॅट घेऊन गेली. आता काॅट तिच्या गच्चीत आहे. त्यावर बसून तिचा अभ्यास चालू असतो.

पन्नास वर्षाच्या संसारात साथ दिलेली काॅट योग्य स्थळी गेली असे मला वाटले.

सहवासात असलेल्या या गोष्टी निर्जीव नसतातच… त्यांच्यात आपला जीव गुंतलेला असतो.

आपण आयुष्यभर वापरलेल्या वस्तूंची मनात असंख्य आठवणींची साखळी असते…. ठेव असते.

या आठवणींचा मनात एक हळवा.. सुखद असा कोपरा असतो. तो असा मधूनच उघडायचा…

मग त्यांच्या आठवणीत आपले आपण दिवसभर रमुन जातो…. घरी बसून मिळणारा हा सहज सोपा आनंद उपभोगायचा….

तुमच्याकडे होती का अशी कॉट? आल्या का काही आठवणी? …

आता आपलं ठरलंच आहे … अशा गोष्टीत रमायचं…

… त्याचा मनाने पुन्हा एकदा अनुभव, आनंद, आस्वाद घ्यायचा… हो की नाही…

… मग कळवा तुमच्या आठवणी…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “चूक की बरोबर?” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

??

☆ “चूक की बरोबर?” ☆ श्री मंगेश मधुकर

नेहमीच्या वेळेत ऑफिसला निघालो. पिकअवर असल्यानं रस्त्यावर तोबा ट्राफिक. गाडी इंच इंच पुढे जात होती. ही रोजचीच परिस्थिती त्यामुळे आताशा राग, संताप, चिडचिड यापैकी काहीही होत नाही. डोकं शांत असतं. काही वेळानं पुढे सरकत चौकात पोचलो तर रेड सिग्नल लागला. सिग्नलच्या आकड्यांकडे पाहताना “वॉव, वॉव” असा सायरनचा आवाज यायला लागला लगेचच सगळ्या नजरा आवाजाच्या दिशेनं वळल्या. शांत जलाशयावर दगड मारल्यावर जसे तरंग निर्माण होतात अगदी तसं सायरन ऐकून गाडीवाल्यांमध्ये चुळबुळ सुरू झाली.

“घ्या पुढे.. ”

“रस्ता मोकळा करा”

“लाल गाडी हो की पुढे.. ”

“ए बुलेट, फोनवर नंतर बोल आधी गाडी बाजूला घे” एकेक गाडीवाले बोलायला लागले सोबत हॉर्नचा किलकिलाट होताच. अंब्युलन्सला वाट देण्यासाठी जो तो प्रयत्न करू लागला. सिग्नलजवळ सर्वात पुढे असलेल्या पाच-दहा जणांना मागचे गाडीवाले पुढे जाण्यासाठी आग्रह करायला लागले.

“ओ, गाडी घ्या पुढे! ! ”एकजण माझ्याकडे बघत ओरडला.

“सिग्नल! ! ”

“घ्या पुढे काही होत नाही. मामांनी पकडलं तर अंब्युलन्सचं कारण सांगायचं. ते पण काही करत नाही. ”सिग्नल तोडण्यासाठी दबाव वाढत होता. आम्ही मात्र कफ्यूज काय करावं ते समजेना. शेवटी माणुसकी जिंकली. तीस सेकंद बाकी असताना आम्ही गाडी पुढे दामटली आणि काही वेळातच अंब्युलन्स मार्गस्थ झाली परंतु मी मात्र पोलिसांच्या तावडीत सापडलो. पन्नाशीचा पोलिस जाम खतरुड दिसत होता. माझ्याआधी पकडलेल्या लोकांशी उर्मटपणे बोलत होता. माझं लायसेन्स, पीयूसी, गाडीची कागदपत्रे तपासल्यावर साहेब तुसडेपणाने म्हणाले “सभ्य दिसताय आणि सिग्नल मोडता. ” 

“सभ्य म्हणालात त्याबद्दल धन्यवाद! ! सिग्नल मुद्दाम मोडला नाही. महत्वाचं कारण होतं.”

“काहीही असो”

“अहो, अंब्युलन्सला रस्ता मोकळा करून दिला” 

“दंड भरावा लागेल”

“साहेब, मी नियम पाळणारा माणूस आहे”

“असं तुम्ही म्हणताय पण आत्ताच सिग्नल तोडला हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालंय. ”

“सिग्नल मी एकट्यानेच तोडला नाही अजून चारपाच जण होते. ”

“पण सापडलेले तुम्ही एकटेच. बाकीच्यांना नोटिस जातीलच. ”

“चांगुलपणा दाखवला ही चूक झाली का? ”

“ते मला माहिती नाही”

“अहो, जरा समजून घ्या. सीरियस पेशंट असलेल्या अंब्युलन्ससाठी सिग्नल तोडला”

“तुम्हांला काय माहिती की ऍम्ब्युलन्समध्ये सीरियस पेशंट होता. ”

“अंदाज…. साधी गोष्ट आहे. थोडी माणुसकी दाखवली”

“त्यासाठी ट्राफिकचे नियम तोडायची गरज नव्हती. गाडी कडेला घ्यायची”

“एवढं मलाही कळतं पण जागा नव्हती म्हणून.. ”

“तुमच्यासारखे जंटलमन लोक असे वागतात आणि मग ट्राफिकच्या नावानं.. ”

“ओ, बास!! जास्त बोलू नका. इतका वेळ समजावतोय पण ऐकतच नाही. जनरली अशावेळी पोलिस मदत करतात पण तुम्ही..”

“नियम म्हणजे नियम”

“पण काही परिस्थिती अपवाद असतात ना. उगीच दुसऱ्या कोणाचा राग माझ्यावर काढताय. जाऊ द्या. ”

“मी कुठं थांबवलयं. तुम्हीच वाद घालताय. दंड भरा आणि जा”

आमची वादावादी सुरू असताना बघ्यांची गर्दी जमली. आधीच खूप उशीर झालेला त्यामुळे मी माघार घेत दंड भरून पावती घेतली आणि गाडी घेऊन निघालो तेव्हा संतापाने डोकं भणभणत होतं. काहीही चूक नसताना खिशाला भुर्दंड पडला तोही एक चांगलं काम केलं म्हणून… डोक्यात विचारांचं वादळ, मी वागलो ते चूक की बरोबर????

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘‘गगनात विसर्जित होता डोळ्यांत कशाला पाणी…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘गगनात विसर्जित होता डोळ्यांत कशाला पाणी…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

(१० मार्च.. कविवर्य कुसुमाग्रजांचा स्मृतिदिन.. त्यांना ही स्मृतिसुमनांची आदरांजली.)

दि. २२ जानेवारी ९९ हा दिवस मी कधीही विसरणार नाही. तो दिवस म्हणजे आदरणीय कुसुमाग्रजांची आणि माझी अखेरची भेट!

नाशिकहून एक कार्यक्रम आटोपून परतताना, नेहमीप्रमाणे कुसुमाग्रजांचे दर्शन घेऊन निघायचे आम्ही ठरवले. तात्यांची तब्येत बरीच खालावली असल्याने शक्यतो त्यांना कुणाला भेटू देत नाहीत, असे ऐकले होते. दीर्घ आजारानंतर ते कसे दिसत असतील, याचा विचार करत, थोडं बिचकतच मी त्यांच्या खोलीत शिरले. “या S या S ” म्हणून त्यांनी, अर्ध्या तिरक्या पलंगावर पहुडलेल्या अवस्थेत, अतिशय प्रेमानं आमचं स्वागत केलं. त्यांची ती हसरी मूर्ती पाहून मनाला बराच दिलासा मिळाला. मी आणि सुनील त्यांना नमस्कार करून शांतपणे बाजूच्या खुर्च्यांवर बसलो. माझ्या मुलाने, आदित्यनेही नमस्कार केला.

“सध्या नवीन काय चाललंय? ” क्षीण आवाजात तात्यांनी विचारलं. मी म्हटलं. “अटलजींची ‘आओ फिरसे दिया जलाएँ’ या कवितेला चाल लावून मी रेकॉर्ड केलीय. ” तात्या म्हणाले, ” मग म्हणाना. ” एवढ्यात तात्यांच्या जवळचे एक सद्गृहस्थ काळजीने म्हणाले, “अहं. तात्यांना आता काहीही त्रास देऊ नका. आता काही ऐकवू नका. ” परंतु तात्या हसत हसत म्हणाले, ” अहो, तिचं गाणं ऐकणं म्हणजे आनंदच आहे. आणि तो आनंद घ्यायला आपल्याला काहीच हरकत नाही. म्हणू द्या तिला. “

मी गायला सुरुवात केली. शेवटचा अंतरा –

‘आहुती बाकी, यज्ञ अधूरा, अपनों के विघ्नों ने घेरा

अंतिम जय का वज्र बनाने, नवदधिचि हड्डियाँ गलाएँ…. ” गाता गाता मी डोळे किलकिले करून माझा ‘व्हिडिओ ऑन’ केला. तात्यासाहेब प्रसन्न दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वहात होता. मला धन्य धन्य वाटलं त्याक्षणी!

“वा, फारच सुंदर झालंय नि किती वेगळा आणि सुंदर विचार दिलाय अटलजींनी. अशाच चांगल्या कविता गात रहा… ” असा ‘आयुष्यभर जपावा’ असा आशीर्वाद त्यांनी मला दिला. दुसऱ्या कवीलाही मनमुराद ‘दाद’ देणाऱ्या या महाकवीला पहात मी नमस्कार केला.

कुसुमाग्रजांची पहिली कविता ‘खेळायला जाऊ चला’ व ‘मोहनमाला’ त्यांच्या वयाच्या १७व्या वर्षी प्रकाशित झाली. प्रत्येक प्रतिभासंपन्न कलाकाराला, त्याच्या सुरुवातीच्या काळात पाऊल टाकायला जर खंबीर आधार आणि प्रोत्साहन मिळालं तर त्याची झेप ही ‘गरुडझेप’ ठरू शकते. ‘रत्नहाराचे तेजस्वी सौंदर्य, डौलदार शैली, भव्य कल्पना, ज्वलंत भावना, मानवतेविषयीच्या प्रेमामुळे किंवा अन्यायाच्या चिडीमुळे प्रक्षुब्ध झालेल्या कवीमनाचा आविष्कार यांपैकी काही ना काही या कवितांत आपल्याला आकृष्ट करते आणि रातराणीच्या सुगंधाप्रमाणे आपल्या अंतर्मनात असणाऱ्या अनेक चिरपरिचित ओळींचा गोडवा जागृत होऊन आपण म्हणतो, “ही कुसुमाग्रजांचीच कविता आहे…. ’’ असं कुसुमाग्रजांविषयी, त्यांच्या ‘विशाखा’ या संग्रहाची प्रस्तावना अत्यंत प्रेमानं आणि गौरवपूर्ण लिहिणाऱ्या वि. स. खांडेकरांनी तात्यांमध्ये ‘स्वधर्म’ या कवितेचं बीज तर पेरलं नसेल? ‘स्वधर्म’ या कवितेत कुसुमाग्रज म्हणतात;

‘दिवसाचा गुण प्रकाश आहे, रात्रीचा गुण शामलता

गुण गगनाचा निराकारता, मेघाचा गुण व्याकुळता…

तसेच आहे मी पण माझे, तयासारखे तेच असे

अपार काळामध्ये, बनावट एकाची दुसऱ्यास नसे. ‘

आणि तेच वैशिष्ट्य खांडेकरांनी उद्धृत केलंय. योगायोग म्हणजे ‘ज्ञानपीठ’ पारितोषिकाचे मराठीतील पहिले मानकरी वि. स. खांडेकर आणि दुसरे खांडेकरांना ‘गुरुस्थानी’ मानणारे कुसुमाग्रज!

तात्यासाहेबांनी माझ्याही आयुष्याला खऱ्या अर्थाने दिशा दिली. माझ्या आयुष्यात ते ‘दीपस्तंभ’ ठरले. बऱ्याच वर्षांपूर्वी कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवयित्री इंदिरा संतांना ‘जनस्थान पुरस्कार’ मिळाला. त्यादिवशीचे गाणे ऐकून मला, माझे पती सुनीलना व नाशिकच्या बाबा दातारांना (माझ्या सर्व कॅसेट्सचे प्रायोजक) बोलावून त्यांनी स्वत: निवडून दिलेल्या इंदिराबाईंच्या व स्वत:च्या कवितांना चाली लावून, कॅसेट करायची अत्यंत मानाची आणि मौलिक जबाबदारी आमच्यावर सोपवली. प्रखर राष्ट्रप्रेमाइतकेच मराठीवर जाज्वल्य प्रेम करणा-या या महाकवीनं मराठीतील नितांत सुंदर कवितांची मणिमौक्तिकंच माझ्या ओंजळीत दिली.

“मातीचे पण तुझेच हे घर, कर तेजोमय, बलमय सुंदर,

आत तुझे सिंहासन राहे, ये *क्षणभर ये, म्हण माझे हे,

फुलवी गीते सुनेपणावर…….

तिमिराने भरल्या एकांती, लावी पळभर मंगल ज्योती

प्रदीप्त होऊनि धरतील भिंती, छाया तव हृदयी जीवनभर…….! ” असाच आशीर्वाद देऊन कुसुमाग्रजांनी माझा प्रवास पवित्र, अधिक आनंददायी, सुखकर आणि तेजोमय केला.

या मिळालेल्या मणिमौक्तिकांमधून घडलेला पहिला दागिना म्हणजे ‘रंग बावरा श्रावण’ – (निवड कुसुमाग्रजांची – भाग १ ध्वनिफीत) व दुसरा, भाग २ म्हणजे ‘घर नाचले नाचले’ ही ध्वनिफीत ते असताना पूर्ण होऊ शकली नाही, याची राहून राहून खंत वाटते. तरी त्यांच्या आवडीच्या कविता, कॅसेटद्वारे साहित्याच्या पूजकांकडेच नाही, तर जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत पवित्र काम हाती घेतल्याचं आज समाधान आहे.

तात्यांनी ‘रंग बावरा श्रावण’चा प्रकाशन समारंभ इंदिराबाईंच्या प्रति आदर व्यक्त करण्याकरता, इंदिराबाईंच्या बेळगावलाच जाऊन करा, असा सल्ला दिला. असे विचार म्हणजे, एका महान कलावंताने दुसऱ्या महान कलावंताचा केलेला सन्मानच! आम्हीही एखाद्या लग्नसमारंभापेक्षाही जास्त थाटात हा सोहळा २३ ऑगस्ट ९७ रोजी साजरा केला. त्यावेळी ‘बेळगावसारख्या टाकलेल्या शहरात, तू आमचीच आहेस हे अत्यंत प्रेमानं सांगायला ही सारी मंडळी दुरून इथं आलीत आणि आज कुबेराचा सन्मान आहे की काय; असं वाटतंय, ’ अशा भावपूर्ण शब्दांत इंदिराबाईंनी आपला आनंद व्यक्त केला. ही सर्व बातमी तात्यांना त्यांच्या सुहृदांकडून कळली. त्यानंतर मी पुन्हा नाशिकला गेल्यानंतर, त्यांनी आमचे आनंदाने स्वागत केले….. ‘या S S, बेळगाव जिंकून आलात म्हणे, ‘ अशी अत्यंत मायेनं माझी पाठ थोपटली आणि मला एव्हरेस्टचं शिखर चढून आल्याचा आनंद झाला. केवढं सामर्थ्य त्यांच्या स्पर्शात! ‘स्पर्श’ म्हटला कि तात्यांची’कणा’ ही विलक्षण ताकदीची कविता आठवते. गंगामाईमुळे घर वाहून खचून गेलेल्या नायकाला, त्याक्षणी पैशाची गरज नसते; गरज असते फक्त ‘सरांच्या’ आश्वासक आशीर्वादाची. तो म्हणतो,

‘मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेवून, नुसतं लढा म्हणा…. ‘

या ओळी कधी कठीण प्रसंगी आठवल्या तरी अंगात तानाजीचं बळ येतं. ‘सरणार कधी रण… ’ म्हणताना बाजीप्रभू संचारतो अंगात! पण अशा अनेक कल्पना वाचून बुद्धी अवाक् होते.

गेल्या १० मार्चला तात्यासाहेब गेल्याची बातमी ऐकून धस्स झालं. मराठी भाषेचे ‘पितामह’ ज्यांना म्हणता येईल असं वादातीत व्यक्तिमत्व – तेजोमय नक्षत्रांचं आश्वासन – निखळून पडलं. ताबडतोब आम्ही नाशिकला पोहोचलो. तिथं बाहेरच्या अंगणात त्यांचं’पार्थिव’ सुंदर सजवलेल्या चबुतऱ्यावर ठेवलं होतं. त्यामागे मोठ्या अक्षरात पाटी होती,

“अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्, मला ज्ञात मी एक धूलीकण

अलंकारण्याला परी पाय तूझे, धुळीचेच आहे मला भूषण…..! ” ही अक्षरे पाहून वाटलं, पृथ्वीचे प्रेमगीत लिहिणारा पृथ्वी होऊन – 

‘गमे कि तुझ्या रुद्र रूपात जावे,

मिळोनी गळा घालूनिया गळा… ’ असे म्हणत सौमित्राला त्याच्या तीव्र ओढीनं भेटायला तर गेला नसेल?

त्यांचं ते अतिशांत स्वरूप पाहून मला, शेजारच्याच पायऱ्यांवरती उभे राहून –

‘आकाशतळी फुललेली, मातीतील एक कहाणी

क्षण मावळतीचा येता, डोळ्यांत कशाला पाणी…

हे गुणगुणणारे तसंच,

‘ती शून्यामधली यात्रा वाऱ्यातील एक विराणी,

गगनात विसर्जित होता, डोळ्यांत कशाला पाणी… ‘

हे तत्वज्ञान भरलेलं अंतिम सत्य कुसुमाग्रज स्वत: सांगताहेत, असाच भास झाला. ‘गगनात विसर्जित होता डोळ्यांत कशाला पाणी… ‘ हे विचार आचरणात आणणं तर सोडाच, परंतु सुचणेसुद्धा किती कठीण आहे, हे त्याक्षणी जाणवले आणि या महामानवाची प्रतिमामनात उंच उंच होत गेली.

दुसऱ्या दिवशी गोदाकाठ साश्रुनयनांनी निरोप देण्याकरता तुडुंब भरला होता. लहान-मोठी, सारी मंडळी, प्रत्येक मजल्यावर, गच्च्यांवर, झाडांवर बराच वेळ उभी होती. ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ मधून क्रांती नसांनसांत उसळवणारा, सामाजिक जाणिवेचा ओलावा असणारा, माणुसकी जपणारा, ‘नटसम्राट’सारखं कालातीत नाटक लिहिणारा, कादंबरी, लघुकथा, काव्य, लघुनिबंध, अशा अनेक क्षेत्रांत स्वच्छंद संचार करणारा, संयमी कलाकार आणि मला ‘स्वरचंद्रिका’ हा अत्यंत सन्मानाचा मुकुट चढवणारा ‘शब्दभास्कर’ अनंतात विलीन झाला… गगनात विसर्जित झाला. मला मराठीची गोडी लावणाऱ्या, वैभवशाली करणाऱ्या महामानवाला पाहून बराच वेळ मी आवरून धरलेला बांध फुटला…

“एकच आहे माझी दौलत, नयनी हा जो अश्रु तरंगत

दुबळे माझे ज्यात मनोगत, तोच पदी वाहू

मी काय तुला वाहू, तुझेच अवघे जीवित वैभव..

काय तुला देऊ.. ’’

असं मनात म्हणत, मी या नाशिकच्या ‘श्रीरामा’च्या चरणी पुष्पहार वाहिला आणि शेवटी हारातली दोन सुटी फुलं घरी घेऊन आले…. आठवणी कायमच्याच जपून ठेवण्यासाठी!

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पक्षी जाय दिगंतरा… कवयित्री : कै. डॉ. मीना प्रभू…संग्राहक : डॉ. शेखर कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

??

पक्षी जाय दिगंतरा… कवयित्री : कै. डॉ. मीना प्रभूसंग्राहक : डॉ. शेखर कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

काय मरण मरण – मला नाही त्याची भीती

होते सामोरी घेऊन – पंचप्राणाची आरती 

माझं मरण मरण – त्याने यावं अवचित 

त्याच्या शुभ्र पंखावरी – झेपावीन अंतरात 

दवओल्या पहाटेस – त्याचे पाऊल वाजावे

उषा लाजता हासता – प्राण विश्वरूप व्हावे.

माध्यान्हाच्या नीलनभा – जाई गरुड वेधून 

त्याच्यापरी प्राण जावे – सूर्यमंडळा भेदून 

किंवा गोरज क्षण यावा – क्षण यावा आर्त आर्त

जीवितास काचणारी – हुरहुर व्हावी शांत

शांत रजनी काळोखी – घन तिमिर निवांत 

शंकाकुल द्विधा मन – विरघळो सर्व त्यात 

वैशाखीच्या वणव्यात – एक जीव अग्नीकण 

शांतवेल होरपळ – जेव्हा वरील मरण 

जलधारांचा कोसळ – होता सृष्टीचे वसन 

जीव शिवाला भेटावा – बिंदू सिंधूचा होऊन

गारठली पानं सारी – हिमवार्‍याशी झोंबत 

देठी सहज तुटता – न्यावे मलाही सोबत 

नको चुडा मळवट – नको हिरे, मणी, मोती

नका सजवू देहाला – नाही आसुसली माती 

नको दहन दफन – नको पेटी वा पालखी 

मंत्र, दिवा, वृंदावन – मला सगळी पारखी 

नको रक्षा हिमालयी – गंगा अस्थी विसर्जन 

धुक्यात जावी काया – आसमंती झिरपून 

पंच भूतांनी बांधला – देह होता एक दिनी 

पंचतत्वी तो विरावा – नकळत जनांतूनी

खरे सांगू माझे निधन – झाले कार्तिक संपता 

आज त्याची जनापुढे – घडे निव्वळ सांगता 

जाता जाता एक ठेवा – उरी पोटी जो जपावा 

माझ्या कार्तिकची बट – फक्त हृदयाशी ठेवा.

त्याच क्षणी समस्तांची – स्मृती जावी निपटून 

मागे ऊरू नये माझी – भली बुरी आठवण 

स्मृतींची त्या ढिगातून – आठवांचे ढग येती 

डोळा इवला प्रकाश – वेडी आसवे गळती 

नको सोस आता त्यांचा – जीव सत्यरूप झाला 

कशासाठी कष्टी व्हावे – ओघ पुढती चालला.

दुवा मागल्या पिढीचा – पुढचीशी जुळवून 

माझे बळदले काम – सार्थ आता निखळून

असे अब्ज अब्ज दुवे – आजवर निखळले 

विस्मृतीच्या पंखाखाली – दुवे त्यांचेच जुळले 

 दुवे त्यांचेच जुळले… 

या कवितेच्या शेवटी कवयित्रीने लिहिलंय – 

‘सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार आणि माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल मन:पूर्वक क्षमायाचना आता तुमची नसलेली, मीना.’ 

प्रसिद्ध लेखिका, प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू

प्रसिद्ध लेखिका, प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू यांचे १ मार्च २०२५ रोजी दु:खद निधन झाले. पेशाने भूलतज्ञ असलेल्या प्रभू यांनी आपल्या लेखनाने प्रवासवर्णनाला एक वेगळेच वलय प्राप्त करून दिले होते. मराठीत प्रवासवर्णनपर लेखन सातत्याने करणाऱ्या डॉ. मीना प्रभू यांची प्रवास वर्णनाबरोबर कादंबरी आणि कवितासंग्रहही प्रकाशित झाले आहेत. पण त्यांची मराठी साहित्यात ओळख होती ती प्रवासवर्णनकार म्हणूनच. त्यांनी याद्वारे मराठी साहित्यात एक नवा प्रवाह रूढ केला. मीना प्रभू यांनी गोवा येथील महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. तसेच त्यांना दि. बा. मोकाशी पारितोषिक-२०१०, गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मृण्मयी पुरस्कार-२०११, न. चिं. केळकर पुरस्कार-२०१२, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार देखील मिळाले. त्यांनी पुण्यात २०१७ मध्ये ‘प्रभू ज्ञानमंदिर’ हा अत्याधुनिक किंडल लायब्ररीचा प्रकल्प सुरू केला होता.

कै. मीना प्रभू यांनी काही वर्षांपूर्वी त्यांचे मनोगत वरील कवितेतून व्यक्त करून ठेवले होते ही गोष्ट अचंबित करणारी आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

संग्राहक – डॉ. शेखर कुलकर्णी 

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डोंगल ते वाय फाय (बालपण)… भाग – ४ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी  ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? मनमंजुषेतून ?

डोंगल ते वाय फाय (बालपण) भाग – ४ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

दुष्काळ पडायच्या आधीची  दोन वर्षे मजेत गेली. त्यावेळी फारतर आम्ही पाचवी सहावी इयत्तेत होतो.वरील    कालावधीत आमच्या गावात सिद्ध पुरुष आणि त्यांची टीम दाखल झालेली होती. आम्ही त्यावेळी खूप लहान  विद्यार्थी. आमचं कुतूहल कायम जागृत आमच्या गल्लीतील आम्ही बारा तेरा जण त्या सिद्ध पुरुषाच्या मागे. त्यांना काही मदत लागल्यास हजर. त्यांची राहण्याची सोय शिव मंदिरात. तस गाव दहा हजार लोकवस्ती असलेल्.

पटवर्धन संस्थांनाचं गाव कागवाड. गावात पोलीस पाटील, कुलकर्णी, खोत आणि इतर बारा बलुतेदार शेतकरी, कष्टकरी समाज. ते दिवस खूपच सुखाचे. वेळेवर चार महिने पाऊस आणि पावसावर कसलेली शेती अमाप धनधान्य समृद्धी देणारी. काहीजणाच्या शेतात विहिरी व मोट ह्यांची व्यवस्था पण असल्यामुळे तुरळक बागायतदार होतेच. 

आमची शाळा सकाळी आठ ते अकरा दुपारी दोन ते पाच. बऱ्याच वेळा जाग न आल्याने दुपारची शाळा तुडुंब भरत होती. कारण रोज दुपारी चार वाजता मधु गद्रे येऊन कांद्याचे उप्पीट करत असे. संध्याकाळी पाच नन्तर शाळेतचं वर्तमान पत्राच्या कागदावर उप्पीट वाढलं जात असे. शाळेच्या तुकडया बऱ्याच ठिकाणी विखूरलेल्या. कारण शाळेला स्वतःची इमारत नव्हती. त्यामुळे खोताच्या वाड्यात, काटेच्या वाड्यात. तर काही मारुतीचे देऊळ, आणि तालमीत सुद्धा आमच्या तुकडया होत्या. दुपारी चार नन्तर उप्पीटचा वास चहूकडे पसरत असे. त्यामुळे आमचं मन तिकडेच. गुरुजी सुद्धा हे ओळखून होतेच.म्हणून ते पांढ्यांची उजळणी, कविता म्हणणे असा बदल तिथे करीत असत.  शाळेपेक्षा आमचा कल उडाणटप्पूपणा करण्यात गुंग. त्यात सिद्ध पुरुष आल्याने व त्यांची योग्य व्यवस्था व्हावी म्हणून आमची नियुक्ती! हे पथ्यावर पडलेलं.

हे सिद्ध पुरुष म्हणजेच गदग मठाचे “श्री स्वामी मल्लिकार्जुन ” त्यावेळचा काळ धनधान्य समृद्ध असलातरी पैसे कोणाकडे नव्हतेच. 

बाजारात किराणा सामान आणायला ज्वारी, किंवा कापूस,गहू घेऊन जायचे त्याबद्दल्यात वाण सामान भरायचे. भाजी बाजारात गेले तरी ज्वारी कापूस धान्य देऊन खरेदी करायची. असे ते दिवस. घरी भिक्षा मागायला आला तरी त्यांना सुपातून धान्य दिले जायचे. त्यासाठी घरातील पडवीत एक पोत ज्वारी ठेवली जायची. भिक्षा मागणारे पण ज्यास्त परगावचे असायचे. वेळप्रसंगी भाजी भाकरी दिली जायची. गावात एक मात्र चिंता होती ती म्हणजेच प्यायचं पाणी आणि खर्चाचे पाणी दिवस रात्र भरावे लागे.

अश्या परिस्थितीत श्री मल्लिकार्जुन स्वामी गावात आले आणि त्यांनी ठाण मांडले. रोज रात्री आठ ते दहा प्रवचन सोबत तबला आणि झान्ज वाजवणारे शिष्य. सकाळी त्यांचे आन्हीक कर्म आटोपून झाल्यावर त्यांची रोज प्रत्येकाच्या घरी पाद्य पूजा व भोजन होतं असे. सोबत त्यांचे शिष्यगणं पण असायचेच. 

एके दिवशी काय झाले त्यांनी मठाच्या नावावर जमीन मागितली. व लगेच गावच्या लोकांनी माळरानावर दोन एकर जमीन दिली. तेथून खरा खेळ चालू झाला. रोज पाद्य पूजा झाल्यावर हातात झोळी घेण्यासाठी आम्हा मुलांना बोलवले जायचे . व हातात भगव्या धोत्राचे टोक चार मुले धरून घरोघरी भिक्षा मागायला सांगितले जायचे . आमच्या पुढे टाळ आणि पखवाज वाजवणारा वाद्यवृंद पण होताच. जेणेकरून लोकांना कळावे की भिक्षा यात्रा चालू आहे. हे कार्य रोज वर्षभर तरी चालू झालेल होतं . झोळीत दोन, तीन, पाच पैसे, चार अणे आठ अणे क्वचित रुपया पडत असे. तो आम्ही स्वामीजींच्या कडे सुपूर्द करून दुपारी शाळेत हजेरी लावत होतो. शाळा पण बुडत नव्हती व संध्याकाळी उप्पीट पण चुकत नव्हतं.

रोज स्वामीजी प्रवचनात दान करण्यासाठी उद्युक्त करत होतेच. पैसे,धान्य इतर सामग्री पण गोळा होतं होती. गावातील रस्त्यावर पडलेले दगड, गटारातील दगड गोळा करण्याचे काम चालू झाले. व ते बैल गाडीतून माळावर पोहचवण्यात येतअसे बैलगाडी स्वखुशीने शेतकरी देत असतं . बऱ्याच दानशूर लोकांनी वाळू,दगड,किंवा रोख पैसे देत असतं.

आणि एक दिवशी शिवानंद महाविद्यालयाचे बांधकाम चालू झाले. चुना खडी वाळू रगडली जाऊ लागली. बांधकाम मजुरांनी पण आठवड्यातील एक दिवस स्वामी चरणी अर्पण करून पुण्य कामावले. इमारत वर वर येऊ लागली तसे पैसे कमी पडू लागले. त्यातून पण स्वामींनी शक्कल लढवत लॉटरीची योजना राबवली. लॉटरीत प्रपंचांची भांडी कुंडी, सायकल रोज उपयोगी येणाऱ्या वस्तू ठेवल्या. व त्याचे प्रदर्शन पण मांडण्यात आले. लॉटरी तिकिटाची किम्मत होती एक रुपया. त्यावेळी एक रुपया म्हणजे भली मोठी रक्कमचं! 

स्वामीचे रोज प्रवचन चावडीत होतं असे. चावडी गावच्या वेशीत. हा हा म्हणता पंचक्रोशीतील भक्तगण मिळेल त्या वाहनातून येत . त्यावेळी बैलगाडी हेच मोठे वाहन होते. बरेच जण घोड्यावर किंवा सायकल वरुन पण येऊ लागले. श्रावणात तर जर सोमवारी भंडारा पण होऊ लागला. लॉटरीची तिकीट परत छापवी लागली. आणि बघता बघता आमच्या डोळ्यासमोर शिवांनंद महाविद्यालय उभे राहिले.

आम्ही तर रोज झोळी धरून फिरत होतोच. रोज संध्याकाळी परत इमारत कुठवर उंच झाली आहे,हे बघण्यासाठी आतुर असायचो. दिवस सरले .. कॉलेज प्रांगणातचं लॉटरीची सोडत पण झाली. त्यावेळी शिवानंद कला महाविद्यालय पूर्ण बांधून झाले होते.

त्या सिद्ध पुरुषाचे व महाविद्यालयाचे आम्ही पूर्ण साक्षीदार होतो, हे आमचे भाग्यच. 

ह्याच सिद्ध पुरुषांचे श्री सिद्धेश्वर स्वामीजी विजापूर मठाचे प्रमुख पट्ट शिष्य होते. हे दोन्ही गुरु आमचे मार्गदर्शक ठरले, यात तिळमात्र शंका नाही. दिवस कसे सरत होते ते कळत नव्हतं. फक्त आम्ही दिलखुलास जीवन जगत होतो. बालपण म्हणजे काय हे देखील आम्हाला त्यावेळी माहित नव्हते. श्रावण महिना तर आमच्या साठी पर्वणी. सणांची रेलचेल. नागपंचमी ला तर घरोघरी झोपळा टांगलेला असायचा. त्यात एकेक पोत ज्वारीच्या लाह्या घरी तयार केलेलं असतं. फोडणीच्या लाह्या, लाह्याचे पीठ दूध गूळ, हे आमचे त्यावेळेस स्नॅक्स! शाळेत जाताना चड्डीच्या दोन्हीही खिश्यात लाह्या कोंबलेल्या असतं. त्यात शेंगदाणे पण मिसळलेलं. लाह्याचा सुशला. बघता बघता पंधरा ऑगस्ट पण जोडून येई. गावभर भारत माता की जय म्हणत, मिरवणूक होई. शेवटी ती गावाबाहेरच्या हायस्कुल मैदानात विसर्जित होई. तिथे भाषण विविध गुण दर्शन असा कार्यक्रम होऊन त्याची सांगता होई.

झोपाळा पुढे महिना भर लटकत असे. गोकुळ अष्टमी आली की त्याची तयारी वेगळीच. विठ्ठल मंदिरात एका टेबलवर कृष्णाची मूर्ती सजवून ठेवलेली. प्रतिपदे पासून त्या मूर्ती समोर निरंतर पहारा चालू होई. पहारा म्हणजे प्रत्येकी एका जोडीने एक तास उभारून पारा करायचा. एकाच्या हातात वीणा तर दुसऱ्याच्या हातात टाळ. मुखाने नामस्मरण. जय जय राम कृष्ण हरी. प्रत्येकाला घड्याळ लावून दिवसा व रात्री पहारा करायला उभे केले जायचे. त्यात आमच्या गल्लीतील टीमचे सगळेच भिडू सामील. कारण शाळेला दांडी मारली तरी चालत असे.

माझ्या समोर पक्या असायचा त्याला झान्ज द्यायचो व वीणा मी घ्यायचो. कारण पक्या थोड्या वेळात पेंगत असे. एक दिवशी तो असच पेंगत होता. मुखाने जप चालू होता. मी मुद्दाम ग्यानबा तुकाराम तुमचं आमचं काय काम असं त्याला भारकटवल. तो तसाच म्हणायला नेमक त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आले. मी साळसूद होऊन जप केला. पक्याचे तुमचं आमचं काय काम चालू होतं. अध्यक्ष आले आणि त्याला खडकन थोबाडीत मारली. तस ते भेळकंडत खाली पडला. त्याला जाग आल्यावर घाबरलं. रडायला लागलं. लगेच माझा भिडू बदलला गेला. 

रोज दुपारी महाप्रसाद चालू होताच. रोज नवीन नैवेद्य असायचा. रोज बरेच लोक हजर असतं. शेवटच्या दिवशी आम्ही भलं मोठं मातीच गाडगे घेउन दोन तीन गल्ल्या फिरून दूध दही लोणी लाह्या लोणचं असे सगळे प्रसाद गोळा करून शेवटी ते गाडगे श्रीकृष्णाजवळच ठेवत, पहाऱ्याची सांगता होई. श्रावण कृष्ण नवमीला ते गाडगे उंच झाडावर टांगले जाई. संध्याकाळी आमचा गट बालचमू येऊन एकमेकांना खांद्यावर धरून तो बुरुज तयार करून ते गाडगे फोडलं जाई. त्यासाठी रोज आम्ही सराव पण करीत असू.

कोणत्याही खेळाची साधने उपलब्ध नसताना, बरेच गावठी खेळ खेळण्यात मजा येत होती व रंगत पण वाढत होतीच. मध्येच केव्हातरी आलावा उर्फ मोहरम सण येत असे. चार पाच ठिकाणी पीर बसवत असतं. आम्ही मुस्लिम मित्रांना घेउन तिथे पण धुमाकूळ घालण्यात मजा येई. आमच्या चावडी जवळच असलेल्या मसूदीत लहान आकाराचे अकरा पीर बसत. सगळेच पीर संध्याकाळी बाहेर पडत. आम्ही त्यांना घेण्यासाठी चढओढ पण लागतं असे. मुल्ला लोक ओळखीचे लगेच लहान पीर आमच्या खांद्यावर देत असतं.ते घेउन आम्ही पटांगणात नाचत असू. आमच्या अंगावर खोबरे खारीक अभिर पडत असे. अभिर कधी कधी डोळ्यात पण जाई त्यावेळी पिरांची खांदे पलटी होई. 

खाणे पिणे शाळेत जाणे, दंगा मस्ती करणे. परीक्षा पास होणे. असे करता करता सातवी पास कधी झालो ते कळलंच नाही. अधून मधून घरी पाहुणे येत, त्यांची बाड दस्त ठेवणे. त्यांना स्टॅण्डवर पोहचवणे. बस येईपर्यंत तेथेच राहणे, त्यांनी देऊ केलेले पैसे नको नको म्हणत, ते घेणे. घरातून जाताना त्यांचा आशीर्वाद घेणे. वाढ वडिलांची आज्ञा पाळत बालपण पुढे सरकत होते. बऱ्याच गोष्टी मिळत नव्हत्या. आहे त्यात समाधान असणे ही त्यावेळची संकल्पना होती.

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ या ‘ डे ‘ ची खरंच गरज आहे??… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

☆ या ‘ डे ‘ ची खरंच गरज आहे??… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

प्रेमासारख्या नाजुक विषयाचा बाजार मांडायला हया फिरंग्यांना सांगायला नको. ह्यांच्या व्हँलेंटाईन डे वरून मला गझलनवाज भाऊसाहेब पाटणकर यांचा एक शेरवजा किस्सा आठवला.

एकदा एक मूर्ख शायर सूर्यास म्हणतो की

“भास्करा, कीव मजला येऊ लागते कधी मधी,

रात्र प्रणयाची तू रे पाहिली आहे कधी?”

तेव्हा सूर्य उत्तर देतो,

“आम्हासही या शायराची कीव येऊ लागते,

याच्या म्हणे प्रणयास रात्र यावी लागते”.

प्रेम हे काय दिवस ठरवून व्यक्त करायची चीज आहे?

आपलं मराठी-हिंदी साहित्य एवढं समृद्ध आहे की प्रेम व्यक्त करायच्या किती विविध शैली आपणांस ठाऊक होतात. प्रेम ही खरं तर नजरा-नजरेची परिणती आहे.

गदिमा म्हणूनच गेलेयत 

“प्रथम तुज पाहता,

जीव वेडावला… “

यांचं प्रेम सुद्धा एवढं हळुवार की गिरगांव चौपाटीवर भेटूया असे DIRECT न म्हणता ती खाली मान घालून शालीनतेने पी. सावळारामांच्या काव्यात म्हणते की 

“जिथे सागरा धरणी मिळते

तेथे तुझी मी वाट पहाते”

मग एकदाची परतीच्या भेटीची वेळ ठरते. हा कावरा-बावरा झालाय, ती लाजेनं चूर झालीय. सगळं कसं शांत शांत!

ही कोंडी शेवटी तो फोडतो, (सोबतीला पाडगांवकर, खळे आणि हृदयनाथ या त्रयीला घेऊन.) 

“लाजून हांसणे अन्

हांसून ते पहाणे,

मी ओळखून आहे,

सारे तुझे बहाणे! “

भेट झाल्यावर मात्र हृदयात एक अनाहूत हुरहुर सुरू होते. मग परत गदिमा मदतीला येतात,

“हृदयी प्रीत जागते, जाणता अजाणता”

 तोही आपल्या विश्वात नसतोच!

“होशवालों को खबर,

बेखुदी क्या चीज है,

इश्क किजे, फिर समझिये,

बंदगी क्या चीज है! “

प्रेमात ती ठार वेडी झालीय,

म्हणतेय काय 

“मी मनांत हंसता प्रीत हंसे,

 हे गुपीत कुणाला सांगू कसे?”

त्याचे “बहाणे” ती सुद्धा “ओळखून” आहे. तिच्या पाठीशी अस्सल कोंकणी सारस्वत (आरती प्रभू) आहेत, ती म्हणते,

“नाही कशी म्हणू तुला विडा मी दुपारी,

परि थोरांच्या समोर घ्यायची सुपारी! “

ह्याचे बहाणे थांबायची चिन्हे नाहीत. मग तीच म्हणते,

“ये मुलाकात इक बहाना है,

 प्यार का सिलसिला पुराना है! ” 

शैलेंद्रच्या काव्यातच सांगायचे तर 

“घडी घडी मेरा दिल धडके,

हाय धडके, क्यू धडके”

ह्याची खात्री पटलीय पण खुंटी हलवून घट्ट करू पाहतोय.

“कहना है, कहना है,

आज तुमसे ये पहली बार,

तुम ही तो लायी, हो जीवन में मेरे

प्यार, प्यार, प्यार… “

ती त्याच्या “हरकतीने” मोहरून गेलीय.

तृप्त झालीय.

“धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना,

 शब्दरूप आले, मुक्या भावनांना “

आणि मग “झाडांची पाने हलतांत”. तो खूष.

“जेव्हां तिची नी माझी, चोरून भेट झाली,

झाली फुले कळ्यांची, झाडे भरांत आली” आणि तिनं चक्क “होय” म्हटलं!

हा गडाबडा लोळायचा बाकी!

“तुम क्या जानो, मुहब्बत क्या है… “

” कोकिळ कुहूकुहू बोले,

 तू माझा तुझी मी झाले.. “

दोघांत एवढं अद्वैत निर्माण झालं की ती म्हणते

” तुज्ये पायान् रूपता काटां,

माज्ये काळजान् लागतां घांव “

आपण दोघांचे एक कधी झालो हे त्यांना कळलंच नाही. हृदये जरी दोन असली तरी अंतर्मन मात्र एकच होतं.

“दो लब्जों की है बस ये कहानी”

या हृदयीचे त्या हृदयी कधी झाले, ते ह्या युगुलाला कळलेच नाही.

” आज तू डोळ्यांत माझ्या,

 मिसळूनी डोळे पहा,

 तू असा जवळी रहा,

 तू अशी जवळी रहा “

प्रेमाची भावना इतक्या हळुवारपणे व्यक्त करणा-या या कविता ज्या साहित्यात आहेत त्या मराठी भाषेला व्हॅलेन्टाईन डे च्या बाजारू आणि उथळ स्वरूपाकडे बघण्याची गरजच काय?

लेखक : अज्ञात 

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आनंद पेरीत जातांना…” – कवी : श्री दयानंद घोटकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

??

☆ “आनंद पेरीत जातांना…” – कवी : श्री दयानंद घोटकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

एका पालकांनी विचारले “काय सर आज तुम्ही सावरकरांचा पुतळा आणून शाळेत कार्यक्रम केला” मी म्हणालो होय 26 फेब्रुवारी म्हणजे सावरकरांची पुण्यतिथी, आणि मराठी राजभाषा दिन असतो 27 फेब्रुवारीला, आणि 28 फेब्रुवारीला असतो विज्ञान दिन, यावर दुसरे पालक म्हणाले “सावरकरांसारखे क्रांतिकारक तयार करायचा विचार दिसतोय तुमचा” का हिंदुत्ववादी विचार मुलांच्या माथी मारणार आहात??? “

त्यांना काय म्हणायचंय, हे मला नेमकं कळलं होतं मी म्हणालो, स्वातंत्र्यवीर सावरकर हा विषय आपण बाजूला ठेवूया एक समाजसेवक सावरकर आणि मराठी भाषेसाठी आपले योगदान देणारा मराठी प्रेमी हा विचार आपण लक्षात घेऊया 

अहो, पुण्यातील शिक्षण तज्ञ डॉक्टर प्र. ल. गावडे यांनी सावरकर या विषयांमध्ये पीएचडी केली आणि त्यांनी आम्हा काही विद्यार्थ्यांना सावरकरांच्या प्रतिभेची ओळख करून दिली. जयस्तुते आणि ने मजसी ने याच्याही पलीकडे अनेक गीत रचना करणार हा महाकवी यांनी छत्रपती शिवाजी आणि बाजीप्रभू यांच्यावर पोवाडे लिहिले आहेत शिवरायांची आरती’ ही लिहिली आहे संन्यस्त खडग मध्ये नाट्यगीते लिहिली आहेत. हिंदू एकता गीत लिहिले आहे प्रबोधन पर लावण्याही लिहिले आहेत आणि रत्नागिरीला तर पतित पावन मंदिर स्थापन करून त्यांनी सामाजिक एकतेसाठी केलेले कार्य हे सारं पुढच्या पिढीला कळायला हवं ना!! जे आमच्यापाशी आहे ते आम्हाला माहित आहे ते सर्व विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजे ना!! एक साहित्यिक सावरकर त्यांची प्रतिभा आणि प्रतिमा शक्ती आणि मायबोलीवर असलेलं त्यांचं प्रेम मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान अनेक इंग्रजी भाषेतील शब्दांना सावरकरांनी मराठी मध्ये प्रतिशब्द दिले आहेत याची माहिती घ्या असेही मी मुलांना सांगितले. एखादा देशभक्त देशसेवा करीत असतानाच समाजसेवा, स्वभाषा, स्वदेश, स्वधर्म, इत्यादींचा विचार किती वेगवेगळ्या पद्धतीने करतो आणि नुसता विचार नाही तर त्याप्रमाणे आचार आणि कृतीही करतो जसे लोकमान्य टिळकांनी मंडा लेच्या तुरुंगात गीतारहस्य सारखा ग्रंथ लिहिला, डॉक्टर आंबेडकर, साने गुरुजी, महात्मा फुले, सर्वच समाजसेवकांनी लेखन साहित्य केलेले आहे, ते सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांपर्यंत पोहोचवणं. हे आमचं काम आहे, आता ही नववी दहावीतली मुलं थोडी मोठी झाली आहेत. त्यांच्यामध्ये थोडी वैचारिक प्रगल्भता आली आहे, म्हणून त्यांच्यासाठी सावरकर हा विषय आहे. पाचवी सहावी मध्ये साने गुरुजी, आठवीमध्ये लोकमान्य टिळक, याप्रमाणे जशी इयत्ता वाढत जाते त्याप्रमाणे महापुरुषांचे विचार मुलांसमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांवर देश प्रेमाचे संस्कार करायचे असतील आणि मायबोलीची गोडी लावायची असेल मातृभाषेसाठी आपल्याला काही करायचं असेल तर अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमधूनच थोर कर्तृत्ववान माणसांचा इतिहास त्यांचा चरित्र सांगणं हे आमचं कर्तव्य आहे असं मी सर्व पालकांना सांगितलं आता सारे पालक शांत झाले एक जण हळूच मला म्हणाला “माफ करा सर जरा आमचा गैरसमज झाला” लगेच दुसरे पालक म्हणाले हो “जरा गैरसमज झाला” दुसरे म्हणाले “होय, जरा आधी माहीत करून घ्यायला हवी होती” मी म्हणालो घरी आल्यावर आपल्या मुलांची संवाद साधा, त्यांना विचारा आज काय काय झालं? ? शाळेत कोणता कार्यक्रम होता? ? आणि आता एक काम करा सावरकरांचे विज्ञान विषयक विचार त्यांचीही पुस्तक आहेत ही तुम्ही स्वतः वाचा आणि मग मुलांना वाचायला द्या घरामध्ये जसं कपड्यांचा कपाट आहे ना तसे एक पुस्तकांचेही कपाट तयार करा पुस्तकांची खरेदी करा आणि त्यामध्ये सावरकरांची ही पुस्तकं ठेवा लोकमान्य टिळकांचे पुस्तक ठेवा महात्मा फुलेंची पुस्तके ठेवा सुंदर सुंदर चरित्र जेव्हा मुलं वाचतील तेव्हाच त्यांना प्रेरणा मिळेल असे म्हणून मी माझे मनोगत संपवले. पालकांना माझे विचार पटले होते. एक चांगलं सत्कार्य केल्याचे समाधान मला मिळाले होते.

मराठी भाषेसाठी योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम!!!

लेखक : श्री दयानंद घोटकर, पुणे

 (मराठी भाषा गौरव दिनानिमित्त)

मो.  ९८२२२०७०६८

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ३२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – ३२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

तिची परंपरा

धोबी गल्लीतलं अगदी मध्यावरचं चार नंबरचं एक माडीचं घर म्हणजे ढग्यांचं घर. खरं म्हणजे त्या काळातलं ते एक स्वतंत्र कुटुंब असं म्हणायला काही हरकत नाही. संयुक्त कुटुंबाच्या तुलनेत लहानच परिवार असलेलं. म्हणजे आई वडील, पाच मुली आणि आजी असं आठ माणसांचं पण स्वतंत्र कुटुंब. कारण आजीला एकच मुलगा आणि त्याचाच हा संसार. तसं मराठमोळं, साधं, फारशी कठीण, कडक व्रतंवैकल्य न करणारं असलं तरी सांस्कृतिक परंपरा बऱ्यापैकी सांभाळणारं असं हे सुशिक्षित, सुसंस्कृत सभ्य कुटुंब आणि या कुटुंबाच्या केंद्रस्थानी होती ती पिकल्या केसांची, सुरकुत्या कायेची, गालावर एक ओघळता काळा मस असलेली, सावळी, ठेंगणी पण ताठ आणि चमकदार डोळ्यांची आजी.

काळाने अनेक बऱ्या, वाईट, कडू गोड प्रसंगाने तिला अक्षरश: झोडपून काढले होते. पण त्या वादळातही टिकून राहिलेली ती एक ठिणगी होती. प्रस्थापित रूढी, रिती, परंपरा यांच्याशी सतत वाद घालत तिने आयुष्या विषयीची एक स्वतःचीच प्रणाली स्थित केली होती आणि तीच तेव्हां आणि नंतरही त्या कुटुंबाची परंपराच ठरली. जुन्यातलं सकारात्मक तेवढं तिने टिकवलं मात्र नकारात्मक ते सपशेल नाकारले. जे जाचक, प्रगतीला खिळ आणणारे, निरर्थक, केवळ गतानुगतीक असलेलं परंपरावादी तिनं स्व सामर्थ्याने लोटून दिलं आणि त्याचा एक वस्तूपाठवच तिने कुटुंबासाठी ठेवला. म्हणून ढग्यांचं कुटुंब हे वेगळं होतं.

आचार विचार सगळ्याच बाबतीत.

ढग्यांच्या आजीला पाच नातीं वरून खूप जण खिजवायचे. “म्हातारे, तुझा वंश बुडालाच म्हणायचं की!”

आजी इतकी खमकी होती, म्हाणायची,

“ मेल्या! तुझा मुलगा नाक्या नाक्यावर उनाडक्या करत फिरतो तो काय रे तुझ्या वंशाचे दिवे पेटवणार? माझ्या पाच नाती माझे पाच पांडव आहेत. बघशीलच तू. ” नंतर तो कुणी एक जण आजीच्या वाटेला कधीच गेला नाही.

गल्लीतल्या मीनाच लग्न जमत नव्हतं. कारण तिच्या पत्रिकेत कडक मंगळ होता. त्यामुळे पत्रिका जुळवण्याच्या पहिल्याच पायरीवर, आलेल्या स्थळाची पाठ फिरायची. मीना सुंदर होती. गोरीपान, सडपातळ, लांब काळेभोर केस. पलीकडच्या गल्लीतल्या एका मुलाचं मन तिने केव्हाच जिंकलं होतं. दोघेही एकमेकात अडकले होते पण तो खालच्या जातीतला, मीना कायस्थ. शिवाय पत्रिकेचा रेटा होताच. दोन प्रेमी विवाह बंधनात अडकण्याची शक्यताच नव्हती. आजीला जेव्हा हे कळलं तेव्हा दोघांच्याही घरातल्या बुजुर्गांना तिने चांगलंच सुनावलं. “कसली जात पात नि कसल्या पत्रिका पाहता? लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात. जन्मभर मुलांना काय त्या परंपरेच्या बंधनात जखडून ठेवणार आहात का? एक पाऊल पुढे तर टाकून बघा. ”

आजीच्या बोलण्याने दोन्ही परिवारात मत परिवर्तन झालं की नाही माहीत नाही पण त्या दोन प्रेमिकांना मात्र धैर्य प्राप्त झाले आणि त्यांनी लग्नही केलं. त्यांच्या वेलीवर जेव्हा पहिलं फूल उमललं तेव्हां दोघंही प्रथम आजीचा आशीर्वाद घ्यायला घरी आले.

आजी तशी नास्तिक नव्हती. देवावर तिची श्रद्धा होती. घरातल्या खिडकीजवळच्या भिंतीवर एक सुंदर निळकंठाचा फोटो होता. घरातल्या प्रत्येक बाहेर जाणाऱ्या व्यक्तीने त्या फोटोला नमस्कार केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही हा तिचा शिरस्ता होता. मात्र कोणी कधी विसरले तर त्याच्या माघारी ती स्वतःच त्या फोटोला दहादा नमस्कार त्याच्या वतीने करायची. आणि पुटपुटायची,

“ देवा याला क्षमा कर, याचं रक्षण कर. ”

तसे तिचे आणखी काही संकेत होते. शनिवारी नवे कपडे घालायचे नाही. उंबरठ्यावर किंवा जेवताना शिंक आली तर डोक्यावर पाणी शिंपडायचं. ” “वदनी कवळ घेता” म्हटल्याशिवाय जेवायचं नाही, नेहमी हसत खेळत जेवायचं, ताटातलं संपवायचं, मनातला राग जेवणावर काढायचा नाही. वगैरे अनेक.

ढग्यांच्या घरात गौरी, गणपती, ईद, नाताळ सगळ्यांचं स्वागत असे. खंडोबाची तळी भरली जायची. गुढी उभारली जायची, राम जन्म, कृष्णाष्टमी सगळं साजरं केलं जायचं. तेव्हा ती म्हणायची, “ जास्त खोलात जाऊ नये. आनंद मिळेल इतपत कराव सगळं. ”

नैवेद्य दाखवला नाही म्हणून घरातल्या लहान मुलांना तिने कधीही उपाशी राहू दिलं नाही. घरात हळदी कुंकवाचा समारंभ असेल तर ओळखी मधल्या विधवा स्त्रियांना ती सुनेला आवर्जून बोलवायला सांगायची.

शरीपा नावाची एक मुस्लिम स्त्री त्यांच्यासमोर राहायची. तिलाही आमंत्रण असायचं. हा हिंदू हा मुस्लिम, हा जातीचा हा परजातीचा, असा भेदभाव तिने कधीच पाळला नाही. मानवतेची नाती जपली.

फक्त पितृपक्षापुरताच नव्हे तर ती रोजच जेवायच्या आधी कावळ्याचा घास कौलावर जाऊन ठेवायची. कुणी विचारलं तर म्हणायची, ” आपल्या घासात या पशु पक्षांचाही वाटा असतोच ना?”

गाईला घास भरवताना, “ती गोमाता, देवता समान” इतकीच भावना राखली नाही तर मूक, अश्राप प्राण्याची भूक भागवण्याचा तिने प्रयत्न केला. “तहानलेल्या जीवाला पाणी द्यावं भुकेल्याला अन्न द्यावं” मग त्यावेळी तिने स्पृश्य अस्पृश्य काहीही मानलं नाही. परंपरा जपलीही, परंपरा मोडलीही.

सलाग्र्यांच्या घरी सवती सुभा फार होता. एक दिवस सलाग्रे ताईवर तिचा सावत्र मुलगा मुसळ घेऊन तिच्यावर धावून गेला तेव्हा आजीने वरच्यावर त्याचा बलदंड हात पकडला आणि त्याला चांगलेच सुनावले,

“काय रे गधड्या दर शनिवारी मारुतीच्या डोक्यावर तेल घालायला हनुमान मंदिरात जातोस ते या कर्मासाठी का? सावत्र आई असली तरी आईच आहे ना? तिनेच वाढवलं ना तुम्हाला आणि एका स्त्रीवर हात उगारतोस? तेही तोळाभर सोन्यासाठी? उद्यापासून मंदिराची पायरी चढलास तर खबरदार. ढोंगी कुठला!”

अशी नित्य नियमित पूजाअर्चा, व्रतं वैकल्यं, कडक उपास तपास करणाऱ्या लोकांवर तिची बारीक नजर असे. खरोखरच्या देवभोळ्यांना ती म्हणायची, ” एक दिवस तुझा देव तुला पावेल बरं”

नाहीतर बाहेर एक आत एक अशा लोकांना ती थेट सांगायची, ” कशाला कष्टवतोस स्वतःला? तुझा देवही दगड आणि तू ही दगड. ” 

आजी कुणालाच घाबरायची नाही आणि ‘सत्याचा वाली परमेश्वर’ ही तिची श्रद्धा मात्र तिने कधीही सोडली नाही. ज्या हातात तिने बडगा घेतला त्याच हाताने तिने रंजल्या गांजल्यांना भरवले. प्रेमामृताचे घोट पाजले. सकारात्मक जपले आणि नकारात्मकतेला तिने पाठ फिरवली आणि आयुष्यभर तिने तिची ही वैचारिक परंपरा जपली. काळ मागे पडत असताना आणि काळ पुढे जात असतानाही..

आज ती नाही, तिचा लेक नाही, सून नाही. पण तिच्या नाती, पणत्या, पणतु, खापर पणत्या, खापर पणतु सारे आहेत आणि त्या सर्वांच्या जीवनात आजीच्या परंपरेचे अनेक थेंब तळी करून आहेत.

कुणी हे का? हे कसं? हे वेगळं आहे, असं म्हटलं तर त्यावर एकच उत्तर असतं, “हीच आमच्या आजीची परंपरा!”

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कर्तृत्वाचे डोही अभिमान तरंग” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? मनमंजुषेतून ?

“कर्तृत्वाचे डोही अभिमान तरंग” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

“काका, तुझ्याकडे मदर टेरेसांचं पुस्तक आहे का?” 

“का गं ?”

“मला गोष्ट सांगायची आहे. वुमन्स डे आहे ना. ”

“मदर टेरेसांची गोष्ट ?”

“हो.”

“कुणी सांगितलं हे नाव?”

“मिस् ने सांगितलं.”

“पण त्यांचीच गोष्ट का बरं ? दुसऱ्या कुणाची गोष्ट सांगितली तर चालणार नाही का ?”

“नाही.”

“का पण ?”

“त्यांनी सांगितलं, हीच गोष्ट सांगायची म्हणून.”

“हे बघ. आपण एक काम करू. मी तुला दोन गोष्टी सांगतो. मग त्यातली जी गोष्ट आवडेल ती तू सांग. चालेल का ?”

“चालेल. ”

मग मी तिला मदर टेरेसांविषयी माहिती सांगितली आणि पद्मश्री बछेंद्री पाल यांच्याविषयी माहिती सांगितली.

एव्हरेस्ट चा ट्रेक, बर्फातून चालत जाणं, जगात पाचव्या क्रमांकाची एव्हरेस्ट वीरांगना असणं, त्या ट्रेकिंग शिकवतात, जगभरातले लोक त्यांच्याकडे शिकण्यासाठी येतात, हे सगळं तिला फार आवडलं. थ्रिलिंग वाटलं. महिला दिनाच्या कार्यक्रमाला आणखी पाच दिवस होते. हीनं दुसऱ्या दिवशी तिच्या मिस् ना बछेंद्री पाल यांची गोष्ट सांगितली आणि हीच गोष्ट सांगणार आहे असं लोकमान्यांच्या बाण्यानं सांगितलं.

तिच्या मिस् नं गोष्ट ऐकून घेतली खरी, पण त्यांना त्यातून मोटिव्हेशनल असं काही दिसलं नाही म्हणे. त्यांनी सांगितलं, मदर टेरेसांचीच गोष्ट हवी.

ही पुन्हा माझ्याकडे हजर. काय काय घडलं ते तिनं मला सांगितलं. ‘मदर टेरेसांची गोष्ट सांगणार नसशील तर कुठलीच गोष्ट सांगू नकोस’ असं मिस् म्हणाल्या, हेही सांगितलं.

मी तिला विचारलं, “आईबाबा काय म्हणाले ?” 

ती म्हणाली, “तू मदर टेरेसांची गोष्ट सांग. काकाला यातलं काहीही सांगू नकोस. असं आई म्हणाली. ” 

“आणि बाबा ?”

“ह्या ट्रेकर आहेत ना त्या फक्त पद्मश्री आहेत. मदर टेरेसा तर भारतरत्न आहेत. म्हणजे त्या जास्त मोठ्या आहेत, त्यांचीच गोष्ट सांग. असं बाबा म्हणाले. ”

“बरं. चल. तुला अजून एक गोष्ट सांगतो. ती एकदम मोटिव्हेशनल स्टोरी आहे. ” 

“सांग. ”

मग मी तिला लता मंगेशकरांची गोष्ट सांगितली. त्यांचं लहानपण, त्यांनी केलेले कष्ट, सुरूवातीचे दिवस, अंगात खूप ताप असतानाही गाणं कसं गायलं हे सगळं तिला सांगितलं. त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे तीनही पुरस्कार मिळाले आहेत, हेही आवर्जून सांगितलं.

कार्यक्रम तीन दिवसांवर आला होता. हीनं ठरवलं की, मी लता मंगेशकरांचीच गोष्ट सांगणार. दुसऱ्या दिवशी ऑनलाईन शाळेत तिनं तिचा निर्णय मिस् ना सांगितला. पुन्हा तोच प्रकार. मिस् म्हणाल्या, “स्टोरी साधीच तर आहे. यात मोटिव्हेशनल काय आहे?” ही पुन्हा हिरमुसली.

तिच्या मिस् म्हणजे “इतकी चुकीची माहिती इतक्या आत्मविश्वासानं दुसरं कोण देणार ?” या प्रकारच्या शिक्षिका आहेत, हे माझ्या लक्षात यायला फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. मी तिला सांगितलं, “जाऊ देत. तू उद्या मिस् ना सांग, मी कुठलीच गोष्ट सांगणार नाही. ”

तिनं दुसऱ्या दिवशी जसं च्या तसं मिस् ना सांगितलं. त्यांचं (जेवढं होतं तेवढं) धाबं दणाणलं असणार. त्यांनी दोन मिनिटांत तिला सांगितलं की, “तू लता मंगेशकरांची गोष्ट सांगितलीस तरी चालेल. ”

ठरल्याप्रमाणे ८ मार्च रोजी तिनं लता मंगेशकरांची गोष्ट सांगितली. सगळ्यांनी तिचं अभिनंदन केलं. काल ती सगळा वृत्तांत सांगायला घरी आली होती. मग मी तिला विचारलं की, “इंटरनॅशनल वुमन्स डे का सेलिब्रेट करतात, हे तुला माहिती आहे का?” 

ती म्हणाली, “नाही. ”

मग मी तिला १९०८ साली महिलांनी आंदोलन का केलं, १९०९ मध्ये अमेरिकन सोशलिस्ट पार्टीनं आंदोलन कसं केलं, क्लारा जेटकिन यांनी त्याला इंटरनॅशनल कसं केलं, का केलं, १९११ पासून हा दिवस इंटरनॅशन वुमन्स डे म्हणून साजरा कसा होतो, १९७५ पासून युनायटेड नेशन्सने हा दिवस सेलिब्रेट करायला सुरूवात केली, वगैरे सगळा इतिहास सांगितला.

अमेरिका, जर्मनी, रशिया, ब्रिटन, या देशांना महिला दिवस साजरा करण्याची गरज का पडली, हेही सांगितलं. १९१९ साली (म्हणजे महिला दिवस साजरा व्हायला लागून नऊ वर्षं उलटल्यानंतर) आपल्या देशात जालियनवाला बाग हत्याकांडात कितीतरी महिलांना जीव गमवावा लागला, ब्रिटीशांनी कितीतरी महिलांवर अत्याचार केले, हे ही सांगितलं. आपल्या देशात महिलांवर बेछूट अत्याचार करणारे हे लोक त्यांच्या देशात मात्र महिला दिवस साजरा करत होते, हेही सांगितलं.

१९१७ साली रशियामध्ये महिलांनी अन्न आणि शांततेसाठी चार दिवसांचं आंदोलन केलं. त्या चार दिवसांच्या आंदोलनामुळं त्यावेळच्या रशियन झार ला पायउतार व्हावं लागलं आणि रशियन सरकारनं महिलांना मतदानाचा अधिकारही दिला, याचीही माहिती सांगितली. तिला ही सगळी माहिती ऐकून आश्चर्य वाटलं.

ज्यांनी झाशीच्या राणीवर तलवार उगारली, तेच देश महिला दिवस साजरा करण्याची सुरूवात करतात आणि त्याला इंटरनॅशनल रूप कसं देतात, हा विरोधाभास तिच्या लक्षात आणून दिला. ज्यांनी आपल्या देशातली आंदोलनं माणसांना गोळ्या घालून, फाशी देऊन चिरडली, त्यांनी त्यांच्या देशातल्या महिलांच्या आंदोलनाचा सन्मान केला आणि वरून त्याला इंटरनॅशनल केलं, ह्या प्रकाराला काय म्हणावं? 

महिलांना जगभर प्रचलित असणारा सोशल मीडीया वापरू न देणारा ‘चीन’ महिला दिवस किती आनंदानं साजरा करतो, हे तिला सांगितल्यानंतरचा तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

देवीनं महिषासुराला मारलं तो महिला दिवस नाही का ? 

श्रीकृष्णानं द्रौपदीचं रक्षण केलं तो दिवस महिला दिवस नाही का?

प्रितीलता वडेद्दार, कल्पना दत्त, लक्ष्मी सहगल, भोगेश्वरी फुकनानी, बेगम हजरत अली, मातंगिनी हाजरा, कनकलता बरूआ यांनी देशासाठी आपले प्राण दिले, तो महिला दिवस नाही का ? 

भिकाजी कामा यांच्या कार्याकरिता आपण महिला दिवस साजरा करू शकत नाही का? 

आपण यांची केवळ आठवण ठेवून उपयोग नाही, यांचे उपकार न फिटण्यासारखे आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई, बाबाराव सावरकरांच्या पत्नी यशोदाबाई आणि नारायण सावरकर यांच्या पत्नी शांताबाई यांना किती यातना भोगाव्या लागल्या, महिला दिवस साजरा करण्यात पुढाकार घेणाऱ्या ब्रिटीशांनीच त्यांचा किती छळ केला, त्यांची दयनीय अवस्था कशी झाली, हे सगळं विसरणं म्हणजे कृतघ्नपणाच आहे.

वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी भारत छोडो आंदोलनात गोळी लागून कनकलता बरूआ यांचा मृत्यू झाला. ब्रिटीशांनी गोळी मारली त्यांना. पण त्यांना आपण सगळेच विसरून गेलो. २१ व्या शतकात वयाच्या १७ व्या वर्षीच अंगावर गोळी झेलणाऱ्या मुलीला नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला.. ! आपणच आपल्या देशासाठी लढलेल्या सुकन्येला सन्मान देऊ शकलो नाही. त्यांचा फोटोच काय, पण नावही कुठल्या शाळेतून घेतलं जात नाही, पुरस्कार तर लांबच राहिला.

विसाव्या शतकाच्या सुरूवातीला १५ हजार महिलांनी आंदोलन केलं, तर ती एक कृती आज आंतरराष्ट्रीय रूप घेऊन जगभर साजरी केली जाते. पण आपल्या देशातल्या माणसांची, त्यांच्या अशा कर्तृत्वाची देशाच्या संसदेत राष्ट्रीय नेत्यांकडून चेष्टा होते, निंदानालस्ती होते आणि सगळं जग ते पाहतं. आपल्याला आपल्या गौरवगाथेविषयी अभिमान का नाही ? कारण, आपल्याला हे काही माहितीच नाही, कुणी सांगत नाही, कुणी बोलत नाही. ज्यांनी मुलामुलींना या कथा सांगितल्या पाहिजेत, त्यांनाच त्या माहिती नाहीत आणि माहित करून घेण्याची इच्छाही नाही. हेच तर मोठं दुर्दैव आहे.

“जगाला ह्यांचा परिचय करून देण्यात आपण कमी पडलो आहोत, हे नक्की. पण आता सुधारलं पाहिजे. चूक दुरूस्त केली पाहिजे. कर्तृत्वाचा सन्मान करायचा तर प्रत्येकाचाच झाला पाहिजे. कर्तृत्वाची प्रेरणा प्रत्येकातच आहे. तिचं कौतुक करता आलं नाही तरी चालेल, पण त्या कर्तृत्वाविषयी आदर मात्र बाळगलाच पाहिजे. समजलं का ?” मी तिला विचारलं.

“काका, तू मला ह्या सगळ्यांविषयीची आणखी माहिती देशील का? मी पुढच्या वर्षी यावरच प्रोजेक्ट करीन. ” ती.

“नक्की देईन. पण उन्हाळ्याच्या सुट्टीत… ! आता पळा.. परीक्षा आहे ना ? ती संपली की करूया प्रोजेक्ट.. !” मी.

ती आनंदानं गेली. अगदी अनाहूतपणे उघडलेला मनाचा कप्पा बंद करून मी पुन्हा माझ्या कामामध्ये गुंतून गेलो….. ! 

 

© श्री मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ज्ञ

 संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणींच्या पुळणीवर… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

आठवणींच्या पुळणीवर… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आठवणींच्या पुळणीवर फेरफटका मारायला लागलं की, असंख्य वाळूचे कण पायावर उधळत असतात! मग हे बघू का, ते बघू अशी अवस्था होते! ती वाळू पायाला गुदगुल्या करत असते तर कधी ओलसर असेल तर ती चिकटून बसते, जशी मनाला एखादी आठवण सोडत नाही!

तसं आपलं हे आयुष्य म्हणजे एक स्वतःसाठी असलेला मर्यादित सागरच असतो जणू! ज्याप्रमाणे सागराचा अंत कळत नाही, तसंच आपल्याला या मनाची खोली कळत नाही! ओहोटीच्या वेळी जितके आत जावे, तितके समुद्रात ओढले जातो, तसंच या मनाचे! जितके खोल खोल विचार करत राहू, तितकं मन आत आत रुतत जाते! त्या आठवणींची पुळण(वाळू) आत इतकी पाळेमुळे धरून असते की, एक एक जुना क्षण क्षण ही त्या वाळूचा कण कण असते. त्यात पाय नकळत रुतत जातात.

आयुष्याची भरती तर आता संपत आली याची जाणीव आहे. मागे वळून पाहताना जाणवतं, एवढं आयुष्य कसं गेलं आपलं! बालपणाचा काळ सुखात, शिक्षणात गेला. पुढे ४०/५० वर्ष संसार सागरात बुडलो होतो.

काठावरची रेती सुद्धा भेटत नव्हती. सतत उसळणाऱ्या परिस्थितीच्या एकावर एक लाटा येत होत्या आणि पट्टीच्या पोहणाऱ्या सारखे आपण लाटावर लाटा झेलत होतो. कधी कधी नाकातोंडात पाणी जाऊन गटांगळ्या मारायला व्हायचं, पण आपला जीव सांभाळत, तोल सांभाळत त्या लाटांवर स्वार व्हायचं! नवीन उमेद मिळायची मोठ्या लाटा पार पाडताना! बघता बघता काळ सरत चालला आणि शरीराची आणि मनाचीही ताकद कमी होत चालली. आता समुद्र डोळ्यासमोर येतो तेव्हा त्यातील लाटांवर स्वार होण्यापेक्षा किनाऱ्यावर बसून लाटा बघणं हेच बरं वाटतं – म्हणजे तेवढेच करता येतं! समुद्रात न जाताही त्याची विशालता, खोली, रंगरूप, सगळं मनाशी साठवत राहावंसं वाटतं!

तो आहे तसाच आहे – स्थिर, त्याच्या रूपात मग्न! आभाळाची निळाई प्रतिबिंबित होऊन त्याची निळाई कायम दिसते. त्या निळाईत पार बुडून गेलाय तो.. आणि मी- त्याच्यात!

सागराला किनारा आहे, तीच त्याची सीमा आहे आणि आपली ही एक वेगळीच सीमा रेषा आहे! आठवणींची वाळू पायाखालून सरत चालली आहे… एक दिवस असा येईल की हे वाळूत चालणारे पाय मंद मंद होत जातील.. पाणी, वाळू निसटून जाऊ लागेल पाया खालून, आणि शोधता शोधता तो किनारा गवसेल जिथून परतायची शक्यता नाही! त्या अनंत, अथांग सागर किनारी नकळत थांबतील हे पाय आणि डोळ्यासमोर येईल आपल्या गतायुष्याची मन- सागरात उमटणारी झलक! त्यातच विरून जाईल सगळी ऊर्जा, उमेद आणि उभारी!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares