मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक सत्यकथा… कथा घडली सुमारे ३५ वर्षांपूर्वी.. लेखक : श्री धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? मनमंजुषेतून ?

☆ एक सत्यकथा… कथा घडली सुमारे ३५ वर्षांपूर्वी.. लेखक : श्री धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

मराठवाडय़ातील लातूर या गावात !! मी त्यावेळी लातूरच्या राजस्थान विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकत होतो. आवडीचा विषय अर्थातच इतिहास आणि मराठी!! त्यातही मराठी जास्तच जवळची..!! कारण तो विषय शिकवणाऱ्या बाई खूपच मन लावून शिकवायच्या. त्यामुळे त्यांचा तास म्हणजे आम्हाला वैचारिक मेजवानीच असायची. केवळ पुस्तकात आहे, तितकेच न शिकवता त्याच्या अनुषंगाने इतरही बरेच काही त्या शिकवायच्या. त्यामुळे नकळत दृष्टी आणि मनदेखील व्यापक होत गेले. आज जाहिरातीच्या क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून वावरताना मी केलेल्या जाहिरातीमधील मराठी वाक्यरचना, त्याचे व्याकरण अतिशय नेटके व उठावदार असते, त्याचे सर्व श्रेय त्या ‘मराठी’ शिकवणाऱ्या बाईंचेच !!!

त्याकाळात त्यांनी जे मन लावून शिकवले.. ते केवळ परीक्षेतील दहापाच मार्कापुरते नव्हते तर अंत:करणापासून शिकवलेले असल्याने आमच्याही काळजात ‘मराठी’ ही संस्कृती रुजली आहे. याचे संपूर्ण श्रेय त्यांनाच !!

तर एकेदिवशी अशाच नेहमीप्रमाणे त्या तासावर आल्या. मराठवाडय़ातील परभणीचे एक महान कवी बी. रघुनाथ यांची ‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली’ ही कविता आम्हाला त्यावेळी पाठय़क्रमात होती. ती कविता बाईंनी शिकवायला सुरुवात केली. ती कवितादेखील त्या कवींच्या वैयक्तिक जीवनातील एक सत्यकथाच होती. ती त्यांनी शब्दांतून सजवली होती. 

कवितेचा थोडक्यात सारांश असा होता की, कवीची मुलगी लहान असताना भातुकलीच्या खेळातील एक लाकडी विठोबाची मूर्ती नेहमी आवडीने खेळायची. त्याच्याशी लाडेलाडे बोलायची. खोटा खोटा दूधभात त्या विठोबाला ती कधी कधी खाऊ घालायची तर कधी लटके रागवायचीदेखील..!! तिच्या विश्वातला तो ‘लाकडी विठोबा’ म्हणजे सर्वस्व होते.

कालांतराने भातुकली खेळणारी कवीची ती मुलगी मोठी होते. यथावकाश परंपरेप्रमाणे तिचे लग्न होते आणि ती मुलगी सासरी निघून जाते. आणि इकडे माहेरी (म्हणजे कवीच्या घरी) एका कोनाडय़ात त्या भातुकलीचा खेळ पडून राहतो. त्यातच तिचा तो लाकडी विठोबादेखील पडून असतो. त्याच्याकडे पाहिल्यावर कवीला सासरी गेलेल्या आपल्या त्या लेकीची आठवण येते आणि कवी गहिवरून जातो. कारण मुलगी नसल्याने ते घर, ती भातुकली एकूणच सारे काही मुके मुके झालेले असते.

तो एकलेपणाचा गहिवर शब्दात मांडताना कवी बी. रघुनाथ.. जणू बाकीच्यांना सांगत असतात की.. हा विठोबा असा का एकटा पडलाय? तर त्याची देखभाल करणारी मुलगी जणू त्याची मायच होती, तीच आता तिच्या गावाला (म्हणजे सासरी) गेली आहे. त्या भावनेतून साकारले गेलेले ते अजरामर काव्य म्हणजेच… ‘‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली.. तिच्या मायेची ही पंढरी.. आज ओस झाली’’

ही कविता आमच्या त्या शिक्षिका बाई शिकवत असताना इतक्या तन्मयतेने शिकवत होत्या की नकळतपणे आमच्याही डोळ्यात ‘ती लेक सासरी गेल्यानंतरची वडिलांची भाव विव्हलता’ पाणी आणून गेली..!! कविता शिकवून संपली. वर्ग संपायला अजून पाच मिनिटे शिल्लक होती. वर्गातील सर्व मुले नि:शब्द झालेली..!! आणि त्या शांततेचा भंग करीत हळुवार आवाजात त्या बाई म्हणाल्या..

‘‘मुलांनो… ती जी सासरी गेलेली मुलगी होती ना.. ती म्हणजे मीच आहे. कवी बी. रघुनाथ हे माझे वडील.. माझे लग्न झाल्यावर वडिलांनी माझ्यावर लिहिलेली ती कविता.. होती..’’

हे ऐकताच आमच्या अंगावर सरसरून काटा आला. किती अलौकिक भाग्याचा तो क्षण होता. आम्ही सारेच दिड्मूढ झालो. काय बोलावे काहीच सुचेना.. साक्षात जिच्यावर कविता आलेली, तीच मुलगी मोठी झाल्यावर आम्हाला तीच कविता शिकवायला येते.. किती विलक्षण योगायोग ना..???

त्या बाईंचे नाव.. सुधा नरवाडकर… आता त्या निवृत्त झाल्या असून नांदेड येथे आपल्या दोन्ही डॉक्टर मुलांसह आनंदाने उर्वरित जीवन जगत आहेत..!!

लेखक : श्री धनंजय देशपांडे

लातूर

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सुईबाई गं… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

??

☆ सुईबाई गं… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे  

“मावशी,अगदी थोडं दुखेल हं म्हणत सुनंदाने मला इंजेक्शन दिलं मला रोज इंजेक्शनची सुई टोचवायची म्हणून तीच हळहळायची.

मी म्हटलं,”अगं तू इंजेक्शन देत्येस म्हणून तर मी बरी होत्ये ना.गेला महिनाभर तू माझी किती काळजी घेत्येस. या सुईने तर तुझं आणि माझं इतकं छान  नातं जोडलंना गं बाई “.

तिने माझा हात हातात घेतला आणि प्रेमाने म्हणाली,

“मावशी तुम्ही आयुष्यभर या सुईसारखी किती प्रेमाने नाती जोडली आहेत ऐकतेय ना मी पण, तुम्हाला भेटायला येणार्या लोकांकडून”.

” हो गं बाई, मी आपली माणसं  जोडण्याचं काम करत राहीले हेच माझ्या आवडीचं काम “.

“पण तुला गंमत सांगू का?”

“नाही,पण तुला वाटेल, काय म्हातारी बडबड करतेय, पण तू आहेस ना  गं माझं ऐकायला म्हणून बोलावसं वाटतय “.

इतर वेळेस कोण असतं इथे ?कामापुरतं येतात निघून जातात.

सुनंदा म्हणाली,” नाही मावशी बोला ना मला आवडेल ऐकायला” 

मग मी सरसावलेच,” अगं एकटीच असले ना की काही बाही सुचतं बघं. आत्ता तू सुईचा विषय काढलास ना तर मला नेहमी वाटतं माणसानेच तर सुई शोधली त्यात त्याचे गुण येणारच.

बघ ना….

घरात बाई सगळं जोडते शिवते  बारिक सुईने अगदी बारीक दोरा घालून जसं कुणालाही न दुखवता ती घरातली नाती जपते आणि ती दृढ करते.

पण घरात सुद्धा सगळ्यांना एकच सुई चालत नाही आई बरोबर वेगळ्या सुया वापरते.

 त्या सुईचा एक भाऊ असतो बघ दाभण नावाचा,जाड गोणपाट शिवायला वापरतात बघ.

 जेव्हा दांड मुलं निबर तनामनाची असतात तेव्हा बारिक सुई नाही कामाची तिथे दाभणच पाहिजे दोन दणके धाकदपटशा लागतोच.

ते आईला बोबर ठाऊक असतं जे सगळ्यांना ताळ्यावर आणून एकसंध ठेवेल.

वाकळ गोधडी शिवताना बघ जरा लांब सुई लागते.

खूप अंगभर टाके घालायचे असतात ना.

जेव्हा सर्वांना एकत्र बांधून एकमेकांना एका बंधनात ठेवायचं तेव्हा अशी लांब सुई सगळ्यांना एकत्र बांधून एकमेकांना नात्यांची उब द्यायला शिकवते बघ.

आणि ती क्रोशाची सुई पाहीली आहेस का तू ?

अगं खूप काम केलं मी त्यावर.

त्या सुईला नेढं नसतं बरका नुसता थोडसं नाक वाकवून तो भास केलेला असतो पण धागा बरोबर अडकतो बघ त्यात अशी माणसं असतात बघ फार न गुंतता आपल्या जवळ हात धरुन  ओढून पण छान सुबक जाळीदार काम करुन दाखवणारी पण चटकन वेगळी होणारी जेवढ्यास तेवढं वागणारी त्यांना सौंदर्य असतं पण नात्याची उब नसते.

फार गुंतत नाहीत ती कुठं.  

आणि जरा कुठे एखादा धागा निघाला की पार सगळं कसं सहज उसवत जातं कळतच नाही.

आणि शेवटीss तुमच्याss विणकामाच्या सुयाss त्याना का सुया म्हणतात ?नाही नेढं नाही टोक. मला तर आजकाल event साजरे करणारे असतात किनई ते अश्या सुयांसारखे वाटतात.

अगदी कुणालाही न दुखवता सगळ्यांना पटापट हलवत राहतात एकमेकात गुंतून काम करत असतात तेव्हा असं वाटतं अगदी गळ्यात गळा वाटतो पण काम झालं की प्रत्येक जणं इतका वेगळा होतो की इथे थोड्या वेळापूर्वी अगदी एकमेकांजवळ येऊन  काही छान प्रसंग उभा केला होता असं वाटतच नाही.

कुठेही गाठ नाही सुई टोचल्याची खूण नाही.

कर्तव्य म्हणून सारं काही.

जशी  विणकामाच्या बाबतीत पण गंमत आहे जोपर्यंत एकत्र आहे तोपर्यंत उब.

दोन सुया दोन हातात नाचत नाचत धागे जोडत उब तर निर्माण करतात पण…पण सुईतून एक धागा ओढत गेलं की सगळं विणकाम उसवलं की तिथे काही दिसतच नाही काही विणलं होतं का नाही ते. अगदी तसच.

मध्ये कुठे नात्यांच्या गाठी बांधलेल्याच नसतात या सुयांनी पण खरी सुई कुणाची सांगू तुमच्या डॉक्टर लोकांची.

त्यांना साक्षात दंडवत बघ.

माणसाचं फाटलेलं शरीर जोडून परत एकसंध करणं सोपं नाही किती बारिक दोरा त्यांच्या चिकाटीचा,किती बारिक सुई त्यांच्या ज्ञानाची, अलगद हाताने टाके घालणं आणि परत ते आत विरघळून जातील असं पाहणं हे फक्त देवाचे हातच करु शकतात बघ.

त्यांची सुई पुनर्जन्म देते गं रुग्णाला आणि तुमच्यावरचा म्हणजेच देवावरचा आमचा विश्वास दृढ करते.

एकच वाईट वाटतं बघ इतक्या  सुयांनी किती मदत केली आपल्याला…..

पण बाप्पाने, डोक्यावरच्या फाटक्या आभाळाखालचं एखाद्याचं  फाटकं नशिब शिवायची सुई दिली नाही बघ माणसाला…….

“सुईबाई गं… तुलाही वाईट वाटत असेल ना मी इतकं सगळं शिवते मग मला असं नशिब का नाही शिवता येत?” 

दुवा तरी मिळाला असता.

सुनंदाने पाहिलं मावशी  आपल्याच तंद्रीत होत्या आणि त्यांचे डोळे पाण्याने भरले होते 

ते पाहून सुनंदालाही आपला कढ आवरावा लागला….

तिला वाटलं किती दुखण्यातूनही यांनी मन संवेदनशील राखलय.

असं जगावं आजूबाजूचं जग न्याहाळत त्यातील गंमती शोधत.

लेखिका : सौ. नीलिमा लेले.

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ घर असावे घरासारखे… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ घर असावे घरासारखे… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. संत तुकडोबांची ही कविता मनात ‘घर’ करून राहिली आहे. 

असा विचार मनात आला आणि घर या शब्दानेच मला घेरले. डोक्यात घरघर चालू झाली. नक्की घर म्हणजे काय? कवितेत महाल ,झोपडी ही दोन्ही सुद्धा घराचीच रूपे आहेत ना? 

मग घर म्हणजे काय? रहाण्याची सोय केलेली, ऊन वारा पाऊस यांपासून रक्षण करणारी एक हक्काची जागा?

तसेच सगळे प्रांत, राज्ये पाहिले की लक्षात येते प्रांत बदलला की घराची ठेवणही बदलली जाते. मग हे घर बैठे घर, इमारत, बंगला, झोपडी,फ्लॅट,महाल कोणत्याही स्वरुपात असो. 

मन थोडे मागे गेले आणि आजीची आठवण झाली. आजी म्हणायची घर ही फक्त जागा नसून ती एक संस्कारांची संस्था असते. 

तिच्या या विचारांचा विचार करता करता घर म्हणजे••• मनात घरच उभे राहिले.ती नेहमी म्हणायची ती कविता आठवली श्रीराम बाळकृष्ण आठवले यांची

☆ ते माझे घर…. ☆

ते माझे घर! ते माझे घर! ।।ध्रु.।।

आजी आजोबा वडील आई

लेकरांसवे कुशीत घेई

आनंदाचा बरसे जलधर! ते माझे घर! ।।१।।

कुठेहि जावे हृदयी असते

ओढ लावते, वाट पाहते,

प्रेमपाश हा अतीव सुखकर! ते माझे घर! ।।२।।

भिंती खिडक्या दारे नच घर

छप्पर सुंदर तेही नच घर

माणुसकीचे लावी अत्तर! ते माझे घर! ।।३।।

परस्परांना जाणत जाणत

मी माझे हे विसरत, विसरत

समंजसपणा समूर्त सुंदर! ते माझे घर! ।।४।।

मन मुरडावे, जुळते घ्यावे

सुख दुःखाना वाटुन घ्यावे

भोजन जिथले प्रसाद रुचकर! ते माझे घर! ।।५।।

ज्योत दिव्याची मंद तेवते

शुभं करोति संथ चालते

श्रीरामाची ज्यावर पाखर! ते माझे घर! ।।६।।

बलसंपादन गुणसंवर्धन

धार्मिकतेची सोपी शिकवण

अनौपचारिक शाळा सुंदर! ते माझे घर! ।।७।।

– श्रीराम बाळकृष्ण आठवले

आजीचा अशा घर संस्थेवर विश्वास होता आणि ती तेच संस्कार आमच्यावरही रुजवत होती. 

याच विचारांना धरून तिने घराची संकल्पना अगदी स्पष्ट केली. घर म्हणजे एका कुटुंबातील सगळेजण एकत्र राहून आपुलकी जिव्हाळा जपतील अशी जागा. 

तिने घरासाठी लागणार्‍या सर्व बाबींचा अर्थ नीट समजावून सांगितला. 

घर म्हणजे त्यासाठी प्रथम लागते ती हक्काची जागा. हीच जागा जी आहे ती कोणाकडून हिसकाऊन घेतलेली बळजबरी करून ताब्यात घेतलेली नसावी तर आपुलकीच्या भावनेने तयार केलेली असावी. आणि ती म्हणायची आपुलकीच्या जागेतील  राग लोभ द्वेषाचे खाचाखळगे प्रेम जिव्हाळ्याने लिंपून घरासाठी पक्की जमिन तयार केली पाहिजे. 

त्यानंतर कुटुंबातील मोठे सदस्य यांच्या एकोप्याने घराच्या भिंती उभारल्या पाहिजेत. या भिंतीतून आत बाहेर करायला संस्कृती सकारात्मकता यांचे दार असायला हवे.

आनंद सुख प्रेम यांची हवा खेळती रहाण्यासाठी घराला भरपूर खिडक्या असाव्यात याच खिडक्या नातवंडे पतवंडांचे रूप घेतलेल्या असाव्यात . घराला आशिर्वाद संस्कार यांचे शिकवण देणारे छप्पर पाहिजे. हेच छप्पर आजी आजोबा किंवा त्या पेक्षाही मोठ्या पिढींचे असावे. 

घरात माणुसकी रांधता यावी म्हणून घरातल्या स्त्रीला लक्ष्मीचे रूप देऊन तिच्या समाधानाकडे लक्ष देऊन तिच्या मनासारखे छानसे स्वयंपाकघर असावे. तिथे तिने प्रेमाने रांधलेले अन्न हे प्रसादाचे रूप घेत असते.

मनातील सगळे विकार धुवून टाकायला ते इतरांच्या दृष्टीसही नको पडायला म्हणून केलेला एक आडोसा अर्थात न्हाणीघर / बाथरूम असावे. तिथेच सगळ्यांनी आपापली मने साफ केली की आपोआप प्रसन्नता येते. 

दिवसभर कामे करून सगळेच दमले की शांततेच्या अंथरुणावर तृप्ततेची झोप येण्यासाठी सगळ्यांच्या मायेची गोधडी पांघरायची, उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने एकमेकांच्या कुशीची उशी करून पहायची आजीने त्यासाठी केलेल्या प्रार्थनेच्या अंगाईत सगळ्यांना उर्जा प्रदान करणारी निद्रादेवी प्रसन्न व्हावी म्हणून समाधानाचे निद्रास्थान / बेडरूम असावे.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे सगळे ज्या जागेत घडणार आहे त्या जागेवर लक्ष ठेवण्यासाठी , कृपादृष्टी घर आणि घरातील प्रत्येक सदस्यासाठी असावी म्हणून खास निर्माण केलेले देवघर तर हवेच!! हो ना?

आजीने सांगीतलेला हा अर्थ खरेच मनात घर होऊन राहिला आहे पण••• कालौघात घरापासून विभक्त व्हायला लागते आणि स्वतंत्र घर बांधायला लागते. तिथे आजीच्या संकल्पनेनुसार जमीन नसते तर एकमेकांच्या डोक्यावर बसायला जणू एकावर एक अशी जागा असते. नुसत्या भिंती उभ्या रहातात पण एकोपा आणायला चार जण तरी कुठे असतात? मग यांच्या भिंती समांतर उभारतात••• एकत्र कशा येणार?आपल्या मर्जीप्रमाणे जगताना सकारात्मकतेचे दार कोठून येणार? मग फक्त घरातील वस्तु सुरक्षीत ठेवण्याची सोय म्हणून दार बनते. 

मुलांची खिडकी निर्माण झाली तरी आई वडिल कामाला जाणारे मुलांवर शिक्षणाचा बोजा पाळणाघराचे संस्कार मग आनंद सुखाची हवा येणार कोठून? 

मोठ्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवल्यावर आशिर्वादाचे छप्पर लाभणार कसे?

घरातील स्त्रीच प्रचंड तणावाखाली वावरत असेल तर ती माणुसकी रांधणार कशी? तिच्या हातच्या खाण्याला प्रसादाची सर येणार कशी?

शॉवर,शॅंपू साबण ई अनेक सोयींनी युक्त बाथरूम असले तरी  नाही निर्मऴ जीवन काय करील साबण या उक्तीप्रमाणे मन साफ होईल कसे? इतरांना त्याची बाधा होऊ नये असे असले तरी मुळात तेच साफ नसले तर दुसर्‍याला त्याची बाधा होणारच ना?

उद्याची चिंता डोक्यात ठेवली तर एसी पांघरायला मऊ ढोर(?) अंथरायला प्राण्यांच्या किंवा कृत्रीम फरचे बेड,  असे सुसज्ज बेडरूम असूनही झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेऊनही आढ्याला नजर लावूनच रात्र घालवायची?

आधुनिकतेच्या नावाखाली जागा अडते म्हणून किंवा देव काय करणार असेच मनात घेऊन कुठेतरी टांगलेले देव घरावर कृपादृष्टी ठेवणार?

प्रश्नांनी मनात दाटी केली आणि खरच घर असावे घरासारखे, घरात असावीत घराला घरपण देणारी माणसे, अशा कितीतरी विचारांनी एकत्र घराची ओढ निर्माण झाली. 

घर असावे घराची ओढ निर्माण करणारे आकाशाला हात टेकू नयेत म्हणून विचारांची उंची लाभलेले तरी जमीनीवर घट्ट पाय रोवलेले, घराचे दार नेहमी आपल्या माणसांची  वाट पहात नेहमी उघडे असलेले स्वागतासाठी स्नेहाच्या अंगणात काळजीच्या सड्यावर सौख्याच्या रांगोळीने सजलेले•••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऑक्सफर्डवारी… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

??

ऑक्सफर्डवारी… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

गेल्या वर्षी आम्ही इंग्लंडमध्ये मुलीकडे दोन महिने होतो.यावर्षी सहा महिने होतो.पण यावर्षी घरातली अनेक कामं, मुलीची धावपळ यामुळे घर सोडून फारसं फिरायला गेलो नव्हतो.तसे आम्ही इंग्लंडला पर्यटन म्हणून न जाता मुलीला तिच्या कामात मदत करायलाच जातो. त्यामुळे त्याचं आम्हाला काहीच वाटलं नाही. तरीपण एक दिवस रात्रीची जेवणं आटोपून आम्ही निवांत बसलो होतो तर मुलगी तिथं आली, ” आईपप्पा, उद्या पाऊस नसला तर, आपण ऑक्सफर्डला फिरायला जाऊ”.

सकाळीच आटोपून दहाच्या सुमारास ट्रेनने फॅरिंग्टन, पॅडिंग्टनमार्गे आम्ही ऑक्सफर्डला पोहोचलो. स्टेशनवरून हाॅप ऑन हाॅप ऑफ .. या बसने शहराचा आधी फेरफटका घेतला.गेल्या वर्षी अशाच केंब्रिज या शहराला भेट दिल्याची आठवण जागी झाली. सुमारे तासभराच्या बस प्रवासात शहरातील जगप्रसिद्ध बागा, ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये आणि विख्यात महाविद्यालयांना धावती भेट दिली.

जगभरातील १४ वेगवेगळया भाषांतून माहीती दिली जात होती. इथे काही वैशिष्ट्यपूर्ण बाबी मला जाणवल्या ;

– इथली अनेक महाविद्यालये कित्येक शतकांपासूनची आहेत. जगातील अनेक विख्यात व्यक्तींनी इथून शिक्षण घेतल्याचा इतिहास आहे.

– आजही ह्या महाविद्यालयांच्या वास्तू दिमाखात उभ्या आहेत.

– आपल्याकडे शिक्षण १९ व्या शतकापासून सुरू झाल्याचा उल्लेख आढळतो, मात्र स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा विकास अधिक गतीने झाला.

– मात्र आपल्याकडच्या इमारतींची आजची अवस्था, स्वच्छता आणि तिथले वातावरण यात खूप फरक जाणवला. आपल्याकडे विद्यार्थी निवडणूका, विविध युवक महोत्सव अशा बाबतीत झालेल्या अप्रिय घटनांमुळे शिक्षणाबरोबरच गलिच्छ राजकारण, पैसा आणि इतर साधनांचा गैरप्रकार यामुळे आपल्याकडच्या शिक्षणाला नकारात्मक प्रसिद्धी मिळाली आहे.

– इंग्लंडमधील विशेषत: ऑक्सफर्डमधील अनेक जुन्या, नव्या महाविद्यालयांतून दिले जाणारे शिक्षण आणि एकूणच वातावरण पहाता आपली स्थिती नक्कीच शोचनीय वाटते.

– महाविद्यालये, बागा, ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये पहाताना, स्वच्छ रस्ते, लोकांनी पाळलेली स्वयंशिस्त, वातावरणातील शांतता पाहून अशा बाबी आपल्यासाठी किती मार्गदर्शक आहेत ह्याची जाणीव झाली.

दिवसभरात जगातील एक सुंदर शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध शहराचा प्रवास संपल्यावर सायंकाळी हलकासा पाऊस पडून गेला होता, हवेत खूप गारठा जाणवत होता. म्हणून तिथल्या, डोसा पार्क नावाच्या दक्षिण भारतीय हाॅटेलात गेलो.तिथले सगळे वातावरण दक्षिण भारतीय होते. मोठ्या कागदी कपातून चहा पीत असताना भिंतीवर कृष्णाचे एक लहानसेच पण अतिशय सुंदर चित्र पहायला मिळाले.

लहानपणापासून मी कृष्णाची अनेक चित्रं पाहिली.पण ते चित्र मला खूपच भावले. आजवर कृष्ण म्हटला की, सोबतीला राधा असलेला बासरी वाजवणारा कृष्ण किंवा फार फार झालं तर, महाभारत युद्धात अर्जुनाच्या रथावर आरूढ किंवा अर्जुनाला उपदेश करणारा कृष्ण मी पाहिला होता. अनेक ठिकाणी कृष्णाची देव स्वरूपातली चित्रं पाहिली. मागे आपल्याकडचे एक अतिशय अभ्यासू, पुरोगामी विचारवंतांचे भाषण मी युट्यूबवर ऐकले होते.त्यांच्यामते कृष्ण हा भारतीय संस्कृतीतील एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व. त्याला बदनाम करण्यासाठी ‘पाण्यात कपडे काढून अंघोळ करणाऱ्या गोपींची वस्त्रं पळवून गंमत करणारा खोडकर ‘ अशी त्याची प्रतिमा निर्माण केली. खरंतर अगदी आपल्या देशात असं कोणतं गाव असेल जिथं सार्वजनिक जलाशयावर गावातील स्त्रिया कपडे काढून अंघोळ करतात? आणि क्षणभर ते गृहीत धरलं तरी त्यांची वस्त्रं पळवून नेणा-याला लोकांनी काय केलं असतं ? अशा माणसाला लोकप्रियता मिळाली असती का ? त्या विद्वानांच्या मते राधा हे पात्रही कवींची कल्पना आहे. इंद्राला नैवेद्य देण्याऐवजी तो नैवेद्य आपल्या सर्वसामान्य गुराखी मित्रांना देणारा कृष्ण ही घटना कृष्णाची सर्वसमावेशकता दाखवून देते.या दृष्टिकोनातून डोक्याला साधा फेटा बांधलेला कृष्ण मी या चित्रात पहात होतो. कृष्णाची एका बाजूला देव अशी प्रतिमा निर्माण करायची आणि दुसरीकडे काही कथा त्याच्या नावावर खपवायच्या (ज्यातून त्याचे नकारात्मक चित्र डोळ्यासमोर उभे रहाते) या दोन्हीपेक्षा सर्वसामान्यांचा लाडका आणि बलिष्ठांच्या मुजोरीला भीक न घालणारा कृष्ण मला जवळचा वाटतो.

येताना पॅडिंग्टन रेल्वेस्टेशनवर उतरलो तर काही सुंदर संगीताचे स्वर कानावर पडले.

एका प्लॅटफॉर्मवर काही वादकांच्या वाद्यांतून संगीत सुरेल संगीत ऐकू येत होते. रेल्वे प्लॅटफॉर्म म्हणजे येणा-या जाणा-या रेल्वेगाडयांचा धडधडाट, मधूनच येणारे अनेक कर्णकर्कश आवाज, त्यात मिसळलेल्या निवेदकांच्या सूचना, रेल्वेतून सांडणारी माणसं, लोकांची धावपळ अशा बाबींपेक्षा हे वेगळंच होतं. आमची परतीची ट्रेन येईपर्यंत मी हे पहात होतो.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ – मी गतीचे गीत गाई— ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

 

☆ – मी गतीचे गीत गाई— – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

श्रद्धेय बाबा आमटे आणि संपूर्ण परिवाराचं कार्य अतुलनीय आहे. जिद्दीचा अंगार पेटवलेल्या बाबांनी वंचितांच्या सुखदुःखाशी, आंतरिक वेदनेनं जोडलं जात असताना, खडकाळ, ओसाड, जमिनीतून आनंदवन नावाचं नंदनवन फुलवलं. यात तपस्वीनी साधना ताईंचे हात बळकट तर होतेच.त्यांची पुढली पिढीही… सर्व आदरणीय.. डॉ. विकासदादा, डॉ. भारतीताई तसंच, डॉ. प्रकाशदादा, डॉ. मंदाताई आणि त्यापुढील पिढीही आनंदाने या कार्यात सामील झाली, हे ईश्वराने मानवाला दिलेलं वरदानच आहे!

विकासदादा आणि या कुणाच्याही बाबतीत त्यांच्या कार्याचा गौरव करणं ,म्हणजे सूर्याला पणती दाखवणे होय! या गौरव ग्रंथात प्रत्येकाने त्याबद्दल लिहिले आहेच! त्यामुळे मी आज विकासदादांबद्दल  एक छोटीशी, पण अविस्मरणीय आठवण सांगणार आहे.

साधारण १५ एक वर्षांपूर्वी, ठाण्याच्या गडकरी रंगायतन सभागृहात विकास दादांचा ‘स्वरानंदवन’ हा संगीत रजनीचा कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने मी स्वतः गाडी चालवत दादरहून ठाण्याला  गेले होते.

कार्यक्रम अतिशय रंगला. विकासदादांसह सर्वच जण एकसे एक सुंदर गायले. आश्चर्याने तोंडात बोटे घालावी असे प्रत्येक जण सहजसुंदर गात होते. त्यांचं दैवी गाणं ऐकल्यावर त्यांना ‘differently abled’ कोण म्हणणार? विकासदादांनी संगीताच्या क्षेत्रातही, ही अजोड अशीच कामगिरी केलीय!

विकासदादा स्वतः ही खूप सुंदर गायले. सर्वांचंच मला खूप कौतुक वाटत होतं. ते पाहून  त्यांनी मला थोडं गायला आणि भाषण करायलाही सांगितलं.

कार्यक्रम संपल्यानंतर विकासदादांना माझ्या घरी शिवाजी पार्कला, नव्या घरी येऊन , पायधूळ झाडण्याची मी विनंती केली. सुनीलनेही फोन करून अगत्याने घरी यायचे निमंत्रण दिले. कुठेही आढेवेढे न घेता ते सहजतेनं ‘हो’ म्हणाले आणि माझ्या गाडीत बसले. त्या क्षणी मला काय धन्य धन्य वाटले म्हणून सांगू!

आधीच सर्वांच्या गाठीभेटी घेत उशीर झाला होता. त्यामुळे मी नेहमीप्रमाणे गाडी झूम झूम मजेत हाकली. विकासदादांनीही मोकळ्या रस्त्यावर “पद्मजा, काय सुसाट चालवतेस” म्हणून कौतुक केले. पण काय झाले कोण जाणे! गाडी सायनजवळ आली आणि अचानक बंद पडली! त्या मिट्ट अंधारात रस्त्यावर कोणीही मदतीसाठी दिसेना.मोठी पंचाईत झाली ! इतक्या महान व्यक्तीला मी आदराने गाडीत बसवले खरे, पण कधीही बंद न पडणारी गाडी बंद पडली…. आणि माझ्या डोळ्यांसमोर अंधेरीच आली!

इतक्यात विकासदादा गाडीतून उतरले आणि, “पद्मजा, काही काळजी करू नकोस,” असं म्हणत त्यांनी गाडी ढकलायला सुरुवात केली. मी गचके देत गाडी सुरू केली… परत गाडी बंद…

परत धक्का देणे…असे करत करत पाचव्या मिनिटाला गाडी सुरू झाली, आणि आम्ही सुखरुप घरी आलो.

सुनील वाट पाहतच होता. मी विकासदादांचं  औक्षण केलं. त्यांनी माझ्या घरी पायधूळ झाडल्याने, माझं घर आनंदाने न्हाऊन निघालं ! त्याआधी त्यांना गाडीसाठीही पायधूळ झाडावी लागली याची मला खंत आणि लाजही वाटत होती. परंतु त्रासाचा, कटकटीचा किंवा क्लेषाचा लवलेशही विकास दादांच्या चेहर्‍यावर नव्हता. कित्ती सहजपणाचे हे वागणे !

बाबांसारख्या महान योगी, तपस्व्याचे कार्य पुढे नेणाऱ्या, त्यांच्या आणि साधनाताईंच्या मुशीत घडलेल्या या अत्यंत साध्या, निगर्वी आणि कर्तृत्ववान अशा विकासदादांचे औक्षण करताना बाबांच्याच ओळी मला आठवत होत्या…

शृंखला पायी असू दे

मी गतीचे गीत गाई…

दुःख उधळायास आता

आसवांना वेळ नाही….

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ झेन आणि आनंदी राहण्याची कला ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ झेन आणि आनंदी राहण्याची कला ☆ श्री सुनील काळे 

झेन आणि आनंदी राहण्याची कला 

काही दिवसांपूर्वी झेन तत्वज्ञानाविषयी एक पोस्ट वाचनात आली होती . त्या पोस्टमध्ये फार सोप्या शब्दात जीवन आनंदाने जगण्याची तत्वे सांगितली होती .

* झेन हा शोधाचा आणि आनंदाने जगण्याचा मार्ग आहे. आयुष्याला आत्ता आणि इथेच अनुभवण्याचा स्पष्टपणे पाहण्याचा आणि सरळपणे अनुभवण्याचा मार्ग आहे.

* कोणतीही गोष्ट करताना ती मनाच्या विशिष्ट एकाग्रतेने,मनाच्या शांतपणानं आणि साधेपणानं करणं,ज्यात ज्ञानाचा अनुभव येतो आणि त्या अनुभवातून आनंद मिळतो  ही गोष्ट म्हणजे झेन होय.

*आपले आयुष्य जगत असताना आपल्या सोबत घडणारी प्रत्येक गोष्ट ही आपल्या सोबत घडु शकणारी सर्वोत्तम गोष्ट आहे असे समजावे म्हणजे आपण आनंदात जगु शकतो.

* तुमचा सर्वात वाईट शत्रू तुमचे जितके नुकसान करु शकणार नाही तितकेच बेसावध विचार तुमचे नुकसान करु शकतात पण एकदा का आपण त्यांच्यावर प्रभुत्त्व मिळवले की आपण आनंदाने राहु शकतो.

* माणसाच्या मनातल्या नकारात्मक भावना या मानसिक आजारासाठी कारणीभूत ठरतात तर सकारात्मक भावना या रोगमुक्तीसाठी अत्यंत आवश्यक असतात.

* एखादी गोष्ट तेव्हाच अनुकूल ठरते जेव्हा माणूस तिच्याशी जुळवून घेतो.

* आयुष्याच्या मार्गांवर जशी तुमची वर्तणूक असेल त्याचप्रमाणे तुमचे आयुष्य उलगडत जाते.

* तुम्ही तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगांना कशी प्रतिक्रिया देता,हे तुमच्या वैयक्तिक तत्त्वज्ञानानुळे निश्चित होतं.तुमच्या आनंदासाठी आणि हितासाठी ते पुर्णपणे जबाबदार असते .

* सत्य नेहमीच हाताच्या अंतरावर,तुमच्या आवाक्यातच असते.

* जेव्हा धामधुमीतसुद्धा तुम्ही शांत राहु शकता तीच निसर्गाची खरी अवस्था असते.

* जेव्हा तुम्ही दुःखाच्या काळातही आनंदी राहु शकता तेव्हा तुम्ही मनाचे खरं सामर्थ्य पाहु शकता.

* माझ्यासोबत जे काही घडतं ते केवळ मला त्यापासुन सर्वाधिक फायदा व्हावा या एकाच हेतुनं घडते.

* आयुष्यातील अटळ बदलांशी जुळवून कसं घ्यावं,निरोगी मार्गानं तणाव कसा हाताळावा आणि तुमच्या दैनंदिन आयुष्यात आनंद कसा जोपासावा? वर्तमानात जगत असतानाही भविष्य कसं बदलावे ? याविषयी झेन तत्वज्ञान सकारात्मक शिकवते .  

आपण ज्या क्षेत्रात कार्यरत असतो त्या विशिष्ट क्षेत्रात अनेक छोटे छोटे विषय असतात आणि या विषयात सुद्धा अनेक छोटे छोटे संप्रदाय तयार झालेले असतात . या संप्रदायानांसुद्धा अनेक वेगवेगळे फाटे फुटलेले असतात आणि या फाट्यांमध्ये सुद्धा अनेक नवनवीन प्रयोग होत असतात . 

काही जण हे प्रयोग , नव्या दिशा , नव्या वाटा , नवे विचार यांचे सहजपणे आत्मचिंतन करून आपल्या जीवनात खरोखर परिवर्तन करून घेतात . या नव्या चिंतनामुळे जो आतमधून बदल होतो , तो बदल होत असताना व झाल्यानंतर आतमध्ये अनेक रोमांचित घटना तयार होत असतात . 

आपल्या वाढण्याऱ्या शरीरात वयामुळे , अनुभवांमुळे , मनामध्ये खूप नाजुक , हळुवारपणे नकळतपणे खूप आश्चर्यचकीत करणारे बदल होत असतात पण त्याकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो . त्यामूळे खरं तर आपले नुकसानच होते .

झेन तत्वज्ञान स्वतःला ओळखवायला , आतमध्ये डोकावयाला प्रेरीत करत असते .

एकदा एक उत्कृष्ट नाव कमावलेला , निष्णात जसे दिसते तसे रेखाटणारा , रंगवणारा निसर्गचित्रकार होता . तो वेळ मिळाला की सर्व साहीत्य घेऊन निसर्गात जायचा . डोंगर , दऱ्या , इमारती , रस्ते , नद्या , समुद्र , बोटी , किल्ले यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन चित्र काढायचा . अगदी बारीकसारीक सर्व डिटेल्स रंगवायचा , रंगवताना तल्लीन होऊन जायचा . त्याला स्वतःचे रंगवलेले निसर्गचित्र पाहुन खूप आनंद व्हायचा व आपण खूप भारी चित्रकार आहोत असा थोडा अहंकारही त्याच्या मनात निर्माण झाला होता . त्या चित्रकाराने आपल्या निसर्गचित्रांची प्रदर्शने करून थोडेफार व्यावसायिक यशही मिळवले होते .

एक दिवस त्याने आपल्या चित्रांचा एक मोठा गट्टा सोबत घेतला आणि तो त्याच्या एका गुरूनां दाखवायला व मार्गदर्शन घेण्यासाठी घेऊन गेला . हे गुरुजी झेन तत्वज्ञानाचे अभ्यासक होते . मोठी साधना केली होती त्यांनी . गुरुजींनी त्याचे प्रत्येक चित्र नीट ,शांतपणे , व्यवस्थितपणे पाहीले आणि चित्राची फाईल पुन्हा होती तशी ठेवली .

निसर्गचित्रकाराने मार्गदर्शनपर बोलण्याची विनंती केली पण गुरुजी काही पुढे बोलण्यासच तयार दिसेनात. त्याचा मोठा अपेक्षाभंग झाला व तो परत जायला निघाला . निघताना त्याने गुरुजींच्या पायावर डोके ठेवले .

दरवाजातून बाहेर जाताना त्याने पाहीले की गुरुजी काही तरी सांगत आहेत . तो परत आत आला व जमीनीवर मांडी घालून शांतपणे डोळे मिटून बसला .

गुरुजी म्हणाले प्रत्येक ठिकाणी जाऊन जसे दिसते तसे रेखाटण्याचे कौशल्य तू फार कष्टाने मिळवले आहेस . त्याबद्दल तुझे स्वागत व अभिनंदन करतो . पण आता तुझे डोळे मिटलेले आहेत . आता तुझ्या आतमध्ये डोकावून पहा . तिथला निसर्ग तुला दिसतो आहे का ?

आपण सगळेच जण बर्हीमुखी झालेलो आहोत . आपण बाहेरचा निसर्ग , बाहेरचे रुप , बाहेरचे जग पाहुन एकमेकांची कॉपी व तुलना करून , स्पर्धा करून , जसे दिसते तसे पाहतोय . तेच चित्रण कागदावर , कॅनव्हासवर रंगवतो . आतला निसर्ग , आतला आवाज , आतले जग, आतली अद्भूत दृश्ये , आतला आनंद , आतल्या वेदना कागदावर कधी रंगवणार ?  ज्या दिवशी तु आनंद , दुःख , सर्व संवेदना रंगवायला सुरुवात करशील त्यावेळी तुझी चित्रे नक्की वेगळी असतील . निसर्गात फिरशील त्यावेळी चिंतन कर , खूप वेळा नजर खिळवून एकाच ठिकाणी बस . ते दृश्य मनात साठव . शरीरातल्या सर्व रक्तवाहिन्या , धमन्यांमध्ये ते दृश्य खेळते राहील व नंतर हृदयावर त्याचे एक प्रतिबिंब उठेल असे ठरव व नंतर त्या प्रतिबिंबालाच कागदावर उतरव . तन मन धन चित्रांवर केद्रींत कर ,एक वेगळे अनवट चित्र निर्माण होईल . जे आतून येईल ते तुझे खरे चित्र असेल.

मग मी देखील या झेन गुरुजींना मनःपूर्वक नमस्कार केला व आतून चित्र काढता येतात का त्याचा प्रयत्न करू लागलो . मनाच्या आतमध्ये खुप खोलवर गेल्यावर उंचचउंच पाचगणीच्या टेबललॅन्डचे पठार दिसू लागले . त्या पठाराच्या अतिउंच कड्यावर मी स्वतः उभा राहून खाली वाकून पाहतोय असे काहीसे दिसू लागले . सभोवतालच्या डोंगररांगा कडेकपाऱ्या , आसमंतात भरलेली शुद्ध हवा , धुक्याची किमया , सुर्यकिरणांमुळे चमकणाऱ्या निसर्गाचे अद्भूत दर्शन दिसू लागले . मग पेन्सीलने रेखाटणे करण्याचीही गरज वाटत नव्हती . सगळे रंग आपोआप एकमेकांचा हात धरून हे अनोखे आकार , वेगळे भावविश्व वेगळे रूप धारण करून चित्रे कागदावर उतरू लागली . जसजसे आत जावू लागलो तसतसे बाहेरच्या जगाचा विसर पडू लागला . स्पर्धा संपल्या, टिकास्त्रे संपली , द्वेष संपला , विरोध संपला , मोठा चित्रकार होण्याची हाव संपली . आतमध्ये एक अद्भूत उजेड आहे . एक मोठी पोकळी आहे . त्या स्वच्छ निर्वात पोकळीतून प्रवास करताना आता फक्त आनंदच आनंद दिसत आहे .

तुम्ही देखील या झेन गुरुजींचे कधी तरी ऐका 🙏

कदाचित तुम्हालाही झेन गुरुजींचे ऐकल्यामूळे धर्मभेद ,जातीभेद , व्यक्तिभेद , स्वार्थ , आंदोलने , टिकास्त्र , हिंसा , द्वेष , सामाजिक , राजकीय , आर्थिक , मानसिक भेदाभेदीचा विसर पडेल व आपल्या आतल्या अनोख्या विश्वात संचार करून नव्या प्रकाशाचा उजेड सापडेल . 

प्रत्येकाला असा आतला नवा आनंद, नवा उजेड सापडावा यासाठी शुभेच्छा ! 💐

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कोंकणी पोटोबा… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ कोंकणी पोटोबा… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

बघता बघता दोन हजार तेविसाव्व सरून दोन हजार चौविसाव्व्याला सुरवात होईल. तेविसाव्व्याच्या सुरवातीलाच घरातून घोषणा झाली की, मी आता थकले. या वर्षी मी काहीही पदार्थ करणार नाही. म्हणजे जेवणाच्या पानांतली वामांगी व्यंजने आणि इतर काही !

या घोषणेला सुरुवातीलाच हरताळ फासला गेला तो मे महिन्यांत. सोमेश्वरहून कोणीतरी दोन मोठमोठे भोपळी आंबे आणून दिले तेव्हा. इतके ताजे आंबे डोळ्यांसमोर फुकट कसे घालवायचे, या विचाराने हात कामाला लागले. मग काय? एका आंब्याचं गोडं लोणचं आणि दुसऱ्याचा मेथांबा! दोन्ही पदार्थ विलक्षण रुचकर! हे एवढंच कसं पुरणार, म्हणून आणखी भोपळी आंब्यासाठी शोभाची बाजारांत ट्रीप झाली. आंबे नाही मिळाले. पण …..

काळे गोल, गोड तीळ मिळाले. (कारळे नव्हेत) हा पदार्थ आजकाल रत्नागिरी बाजारातून दुर्लभ झाला आहे असं कळतं. एकेकाळी भारीवाल्या माम्यांकडे हे तीळ भरपूर असायचे. मग गोड्या तिळकुटाच्या संगतीत पुढचे काही दिवस छान गेले! याच माम्यांकडे कोकणचा मेवा म्हणजे करवंद, अटकं, अळू, तोरणं, हा रानमेवा मिळतो. त्याच्यावर स्वयंपाकघरात काही प्रक्रिया करायची नसते, त्यामुळे हा मेवा अनेक वेळा आणला जातो.

नाचण्याच्या सत्वाची किंवा पिठाची, गोडी किंवा ताकाची आंबटसर आंबिल अधूनमधून होतच असते. पण खिचडीसाठी भिजवलेल्या साबुदाण्यातून उरलेल्याची साबुदाण्याची गोड आणि आंबट लापशी सुद्धा अनपेक्षितपणे होऊन गेली! खूपच स्वादिष्ट लागते.

घावन-घाटलं हा कोंकणातला लोकप्रिय पदार्थ. घावन नाही, पण नाही नाही म्हणतांना घाटलं झालंच. सिंधुदुर्गात तर घावन घाटल्याशिवाय कोणताही सण होऊच शकत नाही. अगदी तेराव्याला सुद्धा घावन घाटलं केलच जातं. तसंच काकडीच्या पातोळ्यांचा बेत आमच्या घरी केलेलाच नव्हता. पण लीलाकडून तेही आले. त्यामुळे तीही रिकामी जागा भरली गेली. नक्की आठवत नाही पण बहुतेक लीलाकडूनच एक बरका फणस आला होता. त्यामुळे सांदणं झाली. मेच्या अखेरीला शोभा बाजारात गेली होती. तेव्हा तिला रायवळचे गोड चवीचे, मोठ्या आकाराचे आंबे मिळाले. कोयाड्यासाठी (आंब्याची पातळ रसाची भाजी – अनेकांना हा प्रकार माहीत नाहीये) अतिशय छान. मग घोषणा राहिली बाजूला आणि सुंदर, रुचकर कोयाड्याची भरती जेवणांत झाली!

खरं सांगू? कितीही ठरवलं आणि कितीही घोषणा केल्या गेल्या,  तरी काही काही पदार्थ हे घरामध्ये केलेच जातात. आणलेला किंवा आलेला पदार्थ नासून फुकट जाऊ नये म्हणून तरी, किंवा काही विशिष्ट समयी, विशिष्ट संकेताने जेव्हा जिव्हालौल्य उफाळतं तेव्हा तरी !

असो. तुका म्हणे सुखी रहावे,

        जे जे होईल ते ते खावे.

लेखक : सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तोच चंद्रमा नभात” ☆ श्री मनोज मेहता ☆

श्री मनोज मेहता

? मनमंजुषेतून ?

“तोच चंद्रमा नभात☆ श्री मनोज मेहता 

कधीकाळी बाबूजींची अन् माझी ओळख तरी होईल का, हेच माहीत नव्हतं, मैत्री तर दूरच ! आणि अचानक डॉ. पुणतांबेकर यांनी १८ एप्रिल २००० रोजी, फर्मान सोडलं, “मनोज, बाबूजींची छायाचित्रं तूच काढायचीत, आपल्याला उद्या त्यांच्या घरी जायचे आहे.” आणि त्याप्रमाणे आम्ही सकाळी १० वाजता बाबूजींच्या घरी पोचलो. सोसायटीच्या नामफलकावर एकच नाव मराठीत होतं, ते म्हणजे………… ‘सुधीर फडके’.

डॉक्टरांच्या मागून मी जरा घाबरतच घरात प्रवेश केला आणि, ज्यांनी करोडो मराठी रसिकांच्या मनावर आपले नाव कोरले, त्यांचे मला साक्षात  दर्शन  झाले. लेंगा – झब्बा, बुटकी मूर्ती, प्रसन्न चेहरा! मी  भारावून काही क्षण पहातच राहिलो. त्यांनी “पाणी घ्या”, असं म्हटल्यावर, मी भानावर आलो.

डॉक्टर आणि बाबूजींचं बोलणं सुरू झालं. आणि माझं काम झपाझप सुरू झालं. आत्ताच्या भाषेत कँडीड छायाचित्रं… पूर्ण रोल संपला. त्यांच्या गप्पा संपल्या व डॉ. पुणतांबेकर म्हणाले, “मनोज आता आमची छायाचित्रे काढ”. 

मी लगेच म्हणालो, “माझी छायाचित्रे काढून झालीत”. 

मी असं म्हणताच डॉक्टर अचंबित होणे स्वाभाविक होते, पण बाबूजींनाही कुतूहल वाटले. गप्पांच्या ओघात त्यांचे माझ्या हालचालींकडे लक्षच नव्हते. आम्ही मग चहा घेऊन डोंबिवलीत परतलो. 

दुसऱ्या दिवशी मी रंगीत छायाचित्रे घरीच डेव्हलप केले आणि डॉक्टरांना फोन करून बाबूजींचा क्रमांक घेतला. बाबूजींशी दूरध्वनीवर बोललो. ते म्हणाले, “अहो, मीच तुमचा क्रमांक मागणार होतो. बरं झालं तुम्हीच दूरध्वनी केला. उद्या येताय का माझ्या घरी, वेळ आहे का तुम्हाला?”

“अहो बाबूजी, मी यासाठीच फोन केला होता, येतो नक्की”, असे सांगून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता दादरला त्यांच्या घरी पोहचलो. त्यांना नमस्कार केला, तेव्हा ते म्हणाले, “नमस्कार आई-बाबांना करायचा”.

छायाचित्रे हातात दिल्यावर, कधी एकदा ते उघडुन पाहू, अशी एखाद्या लहान मुलासारखी उत्सुकता दर्शवणारी बाबूजींची गंमत मी पाहिली. सगळी छायाचित्रे पाहून झाल्यावर मला म्हणाले, “इकडे या हो”. 

मी त्यांच्याजवळ गेल्यावर, त्यांनी दोन्ही हात माझ्या खांद्याला पकडून, माझ्या दोन्ही गालांचे गालगुच्चे घेतले. त्या क्षणाला मला माझा ‘सर्वोच्च बहुमान’ झाला असे वाटले. ते म्हणाले, “अहो, इतकी वर्ष कुठे होतात?”

त्यानंतर डोंबिवलीचे शिवसेनेचे धड़ाडीचे कार्यकर्ते नितिन मटंगे ह्यांनीही, ‘मला बाबूजींच्या गाण्यांच्या सूचीचे पुस्तक करायचे आहे, तूच बाबूजींची छायाचित्रे काढायचे’, असे म्हणून मला त्यांच्या घरी नेले. मला पाहताक्षणी बाबूजी नितिनला म्हणाले, “तुमच्या पुस्तकात माझे झक्कास छायाचित्र येणार”. असे बाबूजींनी म्हणताच, नितिन व वसंतराव वाळुंजकर हे उडालेच ! 

तद्नंतर वारंवार बाबूजींचा आणि माझा कधी प्रत्यक्ष, कधी दूरध्वनीवरून संवाद होणे तर कधी त्यांच्या घरी गप्पांचा फड कसा रंगत गेला हे कळलेच नाही. असे आमचे मैत्रीचे धागे जुळत गेले. 

डोंबिवलीचे बाबूजी, म्हणजे विनायक जोशी, यांचा दिल्लीत महाराष्ट्र मंडळातर्फे कार्यक्रम होता. विनायकचा हट्ट होता छायाचित्रे मनोजनेच काढावीत. हा हट्ट विनायकचा काल, आज व उद्याही असणारच. त्याने इतके अचानकच ठरवले आणि बाबूजींनाही तिथे पुरस्कार दिला जाणार होता.

बाबूजींबरोबर जाण्यास, श्रीधरजींना वेळ नव्हता, म्हणून त्यांनी मला विचारले, “मनोज, तुम्ही याल का माझ्याबरोबर दिल्लीला?” त्यांना मी छायाचित्रे काढायला तिथे येणार हे माहीत नव्हते. माझा तर आनंदच गगनात मावेना! आणि दिल्लीत त्या संपूर्ण सोहळ्यात मी एकटाच छायाचित्रकार ! 

महाराष्ट्र मंडळाचे मुख्य संयोजक श्री. हेजिब यांनी ७ केंद्रीय मंत्र्यांसमोर, श्री. लालकृष्ण आडवाणी ह्यांच्या हस्ते माझा सत्कार केला, तेव्हा बाबूजी म्हणाले, “मनोज, कॅमेरा द्या, मी तुमचं छायाचित्र काढतो.” केवढा हा माझा सन्मान. मला तर गगणाला गवसणी घातल्यासारखे वाटू लागले.

लगेच दोन महिन्यांनी बाबूजींना कलकत्ता येथे पुरस्कार समारंभासाठी जायचे होते. तेव्हाही बाबूजींनी आग्रहाने मला बरोबर नेले. तेव्हा मी बाबूजींना म्हटलं, “बाबूजी, तुमच्यामुळे हा योग आला.” तेव्हा लगेच ते म्हणाले, “तुमचे काम छान आहे, म्हणून सगळे तुम्हालाच बोलवतात.” कुठेही ते स्वतःला मोठेपणा घेत नसत. अशा दिलखुलास, सदाबहार, प्रेमळ पितृतुल्य व्यक्तिमत्त्वाचा सहवास मला लाभला त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.

माझी व शंना नवरे काकांची ४५ वर्षांची मैत्री असूनही, शंना काकांनाही असूया वाटली. गमतीने म्हणाले, “मनोज, तुझी बाबूजींशी इतकी कशी रे मैत्री झाली ?”

बाबूजींना नतमस्तक होऊन म्हणावेसे वाटते,

“सूर गेले दूर आता, शब्द मागे राहीला, चंद्र होता साक्षीला… चंद्र होता साक्षीला….”

© श्री मनोज मेहता

डोंबिवली  मो ९२२३४९५०४४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सुगंधित चिता… वीर हुतात्म्यांच्या !! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? मनमंजुषेतून ?

☆ सुगंधित चिता… वीर हुतात्म्यांच्या !! ☆ श्री संभाजी बबन गायके 

कवी थॉमस मेकॉले यांनी १८४२ मध्ये लिहून ठेवलंय…. ‘मरण तर प्रत्येकाला येणारच आहे… कुणाला आधी तर कुणाला नंतर. परंतू भयावह विपरीत परिस्थितीशी दोन हात करतांना, आपल्या पित्याच्या राखेसाठी आणि मंदिरातल्या देवांसाठी झुंजत असताना येणारं मरण सर्वांगसुंदर!

आपली तरणीताठी पोरं अशीच मरणाला सामोरी जाताहेत. आजवरच्या सर्व मोठ्या युद्धांपेक्षा जास्त भयावह युद्ध आपले सैन्य आपल्याच सीमेमध्ये लढते आहे. आपलेच जंगल आहे मात्र त्यात परकी क्रूर श्वापदं शत्रूच्या मदतीने घुसून दबा धरून बसलेली आहेत. त्यांनी आपल्यावर झेपा टाकण्याआधी त्यांच्या अंगावर धावून जाणं हा एक धाडसी पण अपरिहार्य मार्ग उरला आहे आपल्या हाती. कारण ही जनावरं जर मुलुखात शिरली तर किती निरपराध माणसं मारतील ते सांगता येत नाही. त्यामुळे त्यांच्या पावलांचा माग काढीत काढीत त्यांच्या गुहांमध्ये शिरावंच लागतं. यात आपल्या जीवाला सर्वाधिक धोका आहे आणि हे प्रत्येकाला ठाऊक आहे… आणि तरीही आपली मुलं त्या अरण्यात शिरतात. कधी शिकार गवसते तरी कधी शिकार बनावं लागतं.

या जीवघेण्या खेळात जाणाऱ्या जीवांचा हिशेब ठेवण्यास कुणाला सवड असो नसो…. आईबापाला एकुलती एक असलेली, थोड्याच दिवसांत लग्नाच्या बोहल्यावर उभी राहण्याच्या तयारीत असलेली, सणासुदीला नाही निदान नंतर काही दिवस घरच्यांना, म्हाताऱ्या आईबापांना, कोवळ्या लेकरांना भेटायला जावं म्हणून तळमळणारी तरूण, धडधाकट, वाघाच्या काळजाची पोरं आपल्या जीवाचा हिशेब मांडत बसत नाहीत. ती लढताहेत ते आपल्या बापजाद्यांनी प्राणांची बाजी लावून जपलेल्या देशाच्या अखंडत्वासाठी, हृदयमंदिरातल्या देश नावाच्या देवासाठी. ही पोरं जर तिथं उभी राहिली नाहीत तर देश आणि देव यांना वाली कोण असेल?

पण भारतमातेचं सुदैव असं की, एक पडला तर दुसरा त्याच जागी पाय रोवून उभा राहतो… त्याच्या रक्ताचा प्रतिशोध घेण्यासाठी. जबर जखमी झालेलाही बरा झाल्यावर पुन्हा सीमेवर जाण्याची शपथ घेतो…..

देशवासियांनो…. सुखनैव रहा….. पोरं तिथं जागता पहारा देताहेत….. त्यांना जगण्याचा अर्थ कळाला आहे आणि मरण्याची रीत. हे जग सोडून निघून जाणाऱ्या हुतात्म्यांनो.. शुभास्ते पंथान: संतु! इकडे तुमचे देह मांडीवर घेऊन बसणाऱ्या चिता तुमच्या बलिदानाने सुगंधित झाल्या आहेत… सदगतीस प्राप्त व्हालच!

जय हिंद… `जय भारत !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तुळस” ☆ डॉ. माधुरी जोशी ☆

डॉ. माधुरी जोशी

परिचय 

पं. पिंपळखरे, पं.जितेंद्र अभिषेकी, पंडिता शोभा गुर्टू हे गायनातील गुरू.पंडिता रोहिणी भाटे यांना कथक नृत्याला २५ वर्षे गायन संगत.
ना. दा. ठाकरसी कन्याशाळेत संगीत शिक्षिका. ललित कला केंद्र आणि भारती विद्यापीठ येथे संगीत गुरू.

पुरस्कार

  • आदर्श शिक्षक,आचार्य अत्रे शिक्षकोत्तम पुरस्कार.
  • गुणवंत युवा कलाकार,
  • गुणीदास पुरस्कार
  • पंडिता रोहिणी भाटे स्मरणार्थ आदर्श संगतकार पुरस्कार
  • ह्रदयनाथ मंगेशकर करंडक

लेखन

  • बिंदादीन महाराजांच्या कारकिर्दीवर पुस्तक ” बिंदा कहे”
  • अस्तित्व,रानपाखरं एकांकिका पुरस्कार प्राप्त.
  • फलकलेखनावर पुस्तक बोलका फळा.

? मनमंजुषेतून ?

“तुळस” डॉ. माधुरी जोशी 

मी अनेकदा  अगदी मागून आणून,विकत आणून तुळस लावली.पण ती कधी रूजलीच नाही.तसं फेसबुकवर खूप लोक या संदर्भात सल्लाही मागत असतात… कारण अनेकांना  ही समस्या असते. म्हणजे ही ओढ अनेकांना आहे तर. मला तुळस आवडते फार…लावायची असते पण जगत नाही. आजवर उपाय शोधत राहिले… वाट पहात राहिले सुंदर, डौलदार  तुळशीची…

काही कामासाठी एकदा कोकणात गेले होते..बसची वाट पहात होते. बसथांब्यावर बसायची काहीच सोय नव्हती…पण बसथांब्याशेजारीच ग्रामपंचायतीची इमारत होती. मग तिथल्याच एका पायरीवर रुमाल पसरला आणि वाट पहात थांबले.जरा इकडेतिकडे पहात होते अन् ती दिसली. जराशी कोपऱ्यात.बऱ्यापैकी मोठी… हिरवट काळसर पानांनी रसरशीत फुललेली…असंख्य जांभळट छटेच्या मंजिऱ्यांनी डवरलेली….

ना कुणी तिची निगा घेत होतं…ना कसली कुंडी, ना बांधलेला पार…  ना तुळशी वृंदावन….पण ती खूष होती…अगदी तृप्त… समाधानानं डवरलेली… आनंदानं फुललेली… मी आश्चर्यचकित!! ही अशी माझ्याकडे  का नाही भेटतं… मी तर पाणी, उन्हं,औषधं, माया सगळं देते हिला….उत्तर मिळालं नाहीच… आणि बसही आली. मी परतीला निघाले…

काही दिवसांनी अशीच बहिणीच्या फार्म हाऊसवर गेले….दोन चार पायऱ्या चढून वर दार होतं घराचं….पायरीवर पाऊल ठेवलं आणि परत ती दिसली.त्या पायरीला जरा लहानसा तडा गेला होता.जरा मातीची फट झाली होती म्हणा ना…त्या चिरेत तुळशीचं चिमुकलं रोप डोलंत होतं…सतेज पानांचं …अगदी सात आठ इंचच  उंचीचं….जरा वाऱ्याची झुळूक आली की आनंदानं हासणारं ते रोप पाहून मला परत आश्चर्य वाटलं.कोण सांभाळतं याला?कोण पाणी देतं?काळजी घेतं….कोsssणी नाही….तरी ते घट्टमुट्टं उभं आहे…आपल्यातच रमलंय जसं काही…..मी तर थक्कंच…कारण मी किती धडपडत होते आणि माझी  तुळस काही जगंत नव्हती….आम्ही तिला पाहून काळजीनं पायरी चढलो होतो..पण मला वाटलं दुसऱ्या कुणाचा पाय पडू शकतो…आपण तिला तिथून हालवलं पाहिजे…त्या एवढ्याशा पायरीच्या फटीत ती अशी काही खोल घट्ट मुळं धरून रूजली होती ती सहज निघेना.मग उलथनं,खुरपं अलगद वापरून ती काढली आणि शेजारी रिकाम्या जमिनीत लावली…वाटलं ती आनंदेल, खूप खूष होईल,,,पण कसलं काय? तिनं संध्याकाळी मानंच टाकली…जणू पायरीच्या हक्काच्या, प्रेमाच्या तिच्या घरातून तिला बेघर केलं मी….

खूप अपराधी वाटलं.वाटलं बिच्चारी छान डोलत होती…वारा पीत होती…निरागस बाळासारखं हासत होती…. कशाला केलं मी हे?आम्ही परतलो . मनात सल राहिला.परत काही महिन्यांनी एका रविवारी गेलो.पायरीशी गेलो…त्या तुळशीची आठवण झाली…संकोचायला झालं… आणि क्षणात पुन्हा नवा आश्चर्याचा धक्का बसला….तिथे तसंच चिमुकलं,हासरं,सतेज तुळशीचं रोप डोलत होतं.मेव्हणे म्हणाले ते लावलेलं नाही ..ते आपोआप येतंच….मला निसर्गाचं आणि त्या रोपाचंही नवल वाटलं..ही काय जादू…परत तिथंच ही निर्मिती कशी? किती महान आहे निसर्ग यांची साक्षंच पटली…. आणि माझी खंत परत उफाळून आली.मला सुंदर तुळस हवी होती.सुदैवानं अंगण होतं.अगदी कावेच्या रंगाचं वृंदावन ..पणतीचा कोनाडा सगळे लाड केले असते तिचे.छोटा सुबक कट्टा केला असता.परवचा ,गप्पा गोष्टी रंगलं असतं.तिळाचं तेल कापसाची वात वृंदावनाच्या कोनाड्यात उजळलं असतं मंद,शांत,मंगल,पवित्र….शहरी झगमगाटापासून दूर…बालपणापासून ठसलेलं….पण ती माझ्या अंगणात रमतंच नव्हती….त्या ग्रामपंचायतीच्या अंगणातली नाही तर पायरीच्या फटीतली तुळस मला चिडवत होती जणू..

एवढं का हवं होतं मला तिचं अस्तित्व?….कारण तिच्या सान्निध्यातला श्वास प्राणवाचक…प्रसन्न…हवाहवासा….खरंतर ना तिला फूल ना रंगांची पखरण…

पण तिचा हिरवट काळसर पानांचा विस्तार आगळा सुगंधी…औषधी….थेट गाभाऱ्यात भेटणारी तुळस….तिचं रोप कुठेही भेटो नमस्काराला हात जुळणार अशी तिच्यावर श्रद्धा…. श्वासात शुद्ध गंध भरणारच तिचा..मनात आठव कृष्णसख्याचा, विठू माऊलीचा नाही तर सत्यनारायणाच्या पूजेच्या विष्णूसहस्रनामात वाहिल्या जाणाऱ्या तबकातल्या सहस्र तुळशीपत्रांचा….मनात विसावलंय सुवर्णतुलेतलं  ते तुळशीपत्र नाही तर दानावर त्यागाची मोहर उमटवणारं एक पान…निर्मळ,निर्मोही मनाचं रुपडं जणू… नाही तर द्रौपदीच्या अक्षयपात्राचा अन्नपूर्णेच्या थाळीचा दाखला… नाही तर अंतिम प्रवासात मुखावर ठेवलं जाणारं ते पान…

उदात्त विचार,अध्यात्म असो नाहीतर आजीबाईच्या बटव्यातलं बाळाचं औषध,काढा…सगळीकडे तुळशीचं अस्तित्व…सहज,सोप्पं पण अनमोल…म्हणून तर तिला अंगणात,पूजेत मान…केवढीही बाग फुलुदे,अनेक रंग,गंध,आकारांची उधळण होऊदे.‌..तुळशीचं महात्म्य,सौंदर्य,पूजन अ बा धि त!!!!

आणि ती रूजणार तिच्या मर्जीने,,,, तिच्या आनंदानं…. कारण तिला खात्री आहे किती ही माजलेलं तण,गवत उपटा… त्यात वाढलेलं तुळशीचं रोप उपटून फेकणार नाहीत… त्यांची काळजी घेणारंच…फारतर नव्या मातीत नव्या कुंडीत रुजवणार कारण तुळस आहेच मंगल,पवित्र, सात्विक म्हणून तर देवांची ही लाडकी….साधी पण जीव लावणारी , जीव जपणारी…रांगोळीनं साधी तिरकी रेषा काढा आणि तुळशीपत्र ठेवा शेजारी…मनात कृष्णसख्याची बासरी गुंजले आणि रांगोळीच्या रेषात कटीवर कर आणि गळ्यात तुळशीहार मांडा…टाळ मृदंगाच्या घोषात विठुमाऊलीची गळाभेट होईल जणू.. म्हणून तर शेतीची कामं संपवून…कपडे दोनचारंच पण टाळ,मृदंग, वीणा डोईवर तुळशीवृंदावन घेऊन या संतांना आणि विठुरायाला भेटवणारे वारकरी..त्यांची श्रद्धा,माया,प्रेम जाणून  या प्रवासात संगत करते आणि पंढरपुरात अधिक सुखानं, समाधानानं डवरते.,, विठुरायाला आलिंगन देणे…गाभारा तिच्या गंधाने कोंदतो …अशी साजिरी……तुळस !!!

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares