मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ म्हणून काय झाले… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? मनमंजुषेतून ?

☆ म्हणून काय झाले… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

  आम्ही अजूनही मस्ती करतो

    एकमेकांची खेचत असतो

     मस्त शाब्दिक गुदगुल्या करतो

       सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले …… 

 

   आजही आम्ही मस्त नट तो

    खूप खूप shopping करतो

     खादाडी पण करत राहतो

      सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले . …. 

 

   आम्ही यथेच्छ रुसत असतो

      रागाने धुसमुसत राहतो

        पण लगेच छान हसून घेतो

          सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले…… 

 

     परदेश वाऱ्या करत असतो

      देशातही मस्त फिरत असतो

       नव नवीन ठिकाणे पालथी घालतो

          सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले …… 

    

  छान छान साडी नेसून मिरवतो

      पंजाबी ड्रेस ची ही मजा घेतो

        जीन्स पँट ही आपल्याशा करतो

            सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले …… 

 

     आंबट चिंबट जोक ऐकत असतो

       मनसोक्त खिदळत असतो

         पण कधीतरी एकदम गंभीर होतो

              सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले …… 

 

      देवदर्शन करत असतो

         निसर्ग दर्शन पण करत राहतो

            मनःस्वास्थ्य टिकवून ठेवतो

               सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले ……     

 

       टीव्ही यूट्यूब शी नाते जोडतो

        अवतीभवती चे जग जाणून घेतो

          स्वतः च त्यातून काही बोध घेतो

             सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले ….. . 

 

      Get together करत असतो

        मस्त गप्पा झोडत असतो

          प्रत्येकाचे अनुभव share करतो

            सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले ……

 

       गोड गाणे गुणगुणत असतो

         उडत्या गाण्यावर बसूनच थिरकत असतो

           मौज मस्ती करत राहतो

              सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले ….  . 

 

        कधी कधी मुखवटे लावून जगत असतो

          जग रहाटी चा मान राखत असतो

            देवाण घेवाण करून सुखावत असतो

                सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले …… 

 

        Morning walk करत रहातो           

           Sports shoes चे सुख अनुभवतो

              कित्ती स्टेप्स चाललो ते मोजत राहतो

                  सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले ……

 

         Laptop, Tab शी मैत्री करतो

           स्मार्टफोनशी हितगुज करतो

             एकमेकामधील अंतर कमी करतो

                 सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले …… 

       कडू गोळ्या औषधाच्या गिळत असतो

           पण गोड आठवणी मनात घोळवत असतो

             त्याच शिदोरीवर जीवन आनंददायी बनवतो

                सत्तरीच्या झालो म्हणून काय झाले …… 

कवयित्री- अज्ञात

प्रस्तुती : सुनीला वैशंपायन

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सगळंच वाईट नाही, पण — सुश्री विद्या बाळ ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे   

? मनमंजुषेतून ?

☆ सगळंच वाईट नाही, पण — सुश्री विद्या बाळ ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

संक्रांतीनिमित्त पुढचे काही दिवस महाराष्ट्रात सगळीकडे हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरे केले जातीत. पण हळदीकुंकू समारंभाच्या या दुसऱ्या बाजूचा विचार कधी केलाय का? ‘हळदीकुंकू हे स्त्रियांमध्ये जातीपाती आणि भेदाभेद निर्माण करणारं पुरुषप्रधान व्यवस्थेने चालवलेलं एक षडयंत्र आहे, असं मला वाटतं. काळानुरूप विचारही बदलला पाहिजे’, हे सांगत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ — 

माझा हळदीकुंकू या संकल्पनेला विरोध आहे. विचार करायला लागल्यानंतर मी हळदीकुंकू बंद केलं. अनेकदा विचारलं जातं की, ही परंपरा स्त्रिया का चालू ठेवतात?

पुरुषांच्या व्यवस्थेने जे जे सांगितलं ते ते सर्व माझ्यासकट सगळ्यांनी पूर्वीपासून स्वीकारलेलं आहे. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर हळदीकुंकू हा पुरुषांसाठीच स्त्रियांनी केलेला पारंपरिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी पुरुष आहेत. हे म्हणजे चोराच्या हाती जामदारखानाच्या किल्ल्या देण्यासारखा प्रकार आहे. हळदीकुंकू करायचं स्त्रियांनी आणि समाजातलं स्थान बळकट होणार ते पुरुषांचं.

हळदीकुंकवाच्या सणात फक्त सौभाग्यवतीला मान असतो. काही भारतीय संस्कारांमध्ये किंवा कर्मकांडांमध्ये स्त्री ही सौभाग्यवती आणि अपत्यवती असणं आवश्यक असतं. त्यातही मुलगा असेल तर ती तिथे सर्वांत श्रेष्ठ असते.

स्त्री सौभाग्यवती आणि अपत्यवती असण्याचे जे काही रूढ निकष आहेत त्यात तिचं ‘अस्तित्व’ महत्त्वाचं नाही. तिचं अस्तित्व दुसऱ्याच्या स्वाधीन आहे. तिला नवरा असला पाहिजे, तो जिवंत असला पाहिजे आणि त्याच्यापासून मूल असलं पाहिजे. हे हळदीकुंकू परंपरेचे निकष आहेत.

नवऱ्याशिवाय ओळख का नाही?

हळदीकुंकवात कोण सौभाग्यवती, कोण विधवा, कोण परित्यक्ता, कोण ‘टाकलेली’, कोण अविवाहित असे जे भेद केले जातात त्याला माझा विरोध आहे. त्यातही अविवाहितांमध्ये दोन प्रकारच्या स्त्रिया मोडतात. ज्यांना स्वखुशीने लग्न करायचं नाही अशा आणि ज्यांना लग्न करायचं आहे पण अजून झालं नाही अशा. या सर्वांना हळदीकुंकू परंपरा नाकारते.

ज्या स्त्रियांच्या आयुष्यात ‘नवरा’ नावाचा पुरुष नाही त्यांची काहीच ओळख नाही का? हळदीकुंकू या परंपरेच्या व्याख्येत तिची स्वतंत्र ओळख नाही. नवऱ्याच्या ओळखीवरून आणि नवरा असल्यानेच ती ओळखली जाणार, हे अयोग्य आहे. स्त्रियांना न्याय देणारं नाही.

अनेकदा स्त्रियांची ओळख करून देताना अमूक अमूक यांच्या सौभाग्यवती किंवा श्रीमती अशी ओळख करून देतात. याविषयी मी अनेकदा व्यासपीठावर बोलले आहे. एखाद्या स्त्रिला व्यासपीठावर बोलावताना तिचं म्हणणं ऐकायचं म्हणून बोलवता मग ती सौभाग्यवती, श्रीमती किंवा कुमारी असली तर काय फरक पडतो? तुम्ही माझ्यासोबतच्या पुरुषांना विचारता का? तुम्ही विवाहित आहात का, मुलं आहेत का? हे प्रश्न पुरुषांना विचारले जात नसतील तर स्त्रीला का विचारावेत?

बाईची ओळख नवऱ्याच्या ओळखीपलीकडेही असावी.

मी पूर्वी हळदीकुंकवाला जात असे. वयाच्या साधारण पस्तीशीपर्यंत मी व्रतवैकल्यं, पूजा, मंगळागौर या सगळ्या रूढी परंपरा पाळल्या आहेत. मध्यमवर्गीय पारंपरिक चौकटीत जगत असताना मीही त्यात चक्क रमले आणि डुंबले होते. पण मी जसजशी विचार करायला लागले, तसं त्यातली व्यर्थता आणि निरर्थकता माझ्या लक्षात आली. आणि मी हळदीकुंकू करायचं बंद केलं.

बदलाचं पाऊल

मी तसा विचार करणारा ‘माणूस’ कधीच नव्हते. म्हणूनच जरा उशीर झाला. बाहेरच्या जगाची ओळख झाली. वाचायला लागले. मित्रमैत्रिणींशी संवाद व्हायला लागला. आणि मग प्रश्न पडायला लागले. आपण काय करतोय याचं भानही आलं. असा विचार जेव्हा मनात येतो तेव्हाच आपण बदलाचं एक पाऊल पुढे टाकतो.

मला एक हळदीकुंकू पक्क आठवतंय. पन्नास वर्षं झाली असतील. तेव्हा माझी मुलगी लहान होती. मुलीच्या शाळेतल्या मैत्रिणींच्या आईची ओळख होण्यासाठी मी त्यांना घरी बोलावलं होतं. पण रूढार्थाने ते हळदीकुंकू नव्हतं. तर तिळगुळ समारंभ होता.

हळदीकुंकवाऐवजी तिळगुळ समारंभ

तरीही मला वाटतं हळदीकुंकवाऐवजी तीळगूळ समारंभाचा उत्सव झाला पाहिजे. पण त्यातलं कर्मकांड बाजूला काढू या. स्त्रियांच्या मनात रूढ झालेली कर्मकांडाची प्रथा म्हणून असलेलं त्याचं स्वरूप बदललं पाहिजे.

मकरसंक्रांतीचं जसं हळदीकुंकू असतं तसं चैत्रगौरी, वटसावित्री, मंगळागौरीच्या निमित्ताने स्त्रिया एकत्र येतात. किती छान संधी आहे ही. मला असं वाटतं की, सणाच्या निमित्ताने स्त्रियांशी संवाद साधला पाहिजे.

सगळंच वाईट नाही, पण…

आपल्या संस्कृतीतलं सगळंच वाईट आहे, असं मला म्हणायचं नाही. ऋतूबदलाप्रमाणे सण योजणं ही निसर्गाच्या अधिक जवळ जाणारी आणि कल्पक अशी गोष्ट आपल्या संस्कृतीत आहे. त्यामुळे सणाला, परंपरांना नावं ठेऊन चालत नाही तर त्यातील पर्याय शोधावे लागतात.

ज्येष्ठागौरीचं नवं रूप – वसंतोत्सव

गेली दहा बारा वर्षं मी वसंतोत्सवाचं बोलावणं करते. माझ्या काही मित्र-मैत्रिणींसाठी अगदी छोट्या स्वरूपात एक समारंभ करते. जेष्ठागौरीला दिलेलं हे वेगळं रूप आहे. या मोसमात कैऱ्या आलेल्या असतात. त्यामुळे पन्हं देता येतं. आंब्याची डाळ करते. फळं, फुलं सोबतीला असतात. बदलत्या ऋतूचा आस्वाद घेत वसंतोत्सवाच्या निमित्ताने गप्पाही रंगतात. मग हळदीकुंकवाचा प्रश्नच राहात नाही.

जुन्या धाग्याला नवं रूप

अशा प्रकारे लोकांना भेटण्याचं माध्यम तयार केलं, तर आपण संस्कृतीचा धागाही पुढे नेतो आणि सण अधिक व्यापक स्वरूपात करतो. लोकामंध्ये बदल करण्याच्या दृष्टीने सर्वांत आवश्यक गोष्ट असते ती- संस्कृतीतला जुना धागा घ्यायचा आणि त्याला नवं रूप द्यायचं. याच दृष्टीने हळदीकुंकवाकडे बघावं, असं मला वाटतं आणि या निमित्ताने स्त्रियांशी बोललं जावं.

लग्न झाल्यावर मुली हल्ली नावं बदलत नाहीत, हे स्वागतार्ह आहे. पण हळदीकुंकू का करायचं, हे त्या स्वतःला विचारत नाहीत. टिकल्या आणि कुंकवाला माझा विरोध नाही. त्यामागे विचार दिसत नाहीत.

आधुनिक विचार फार कमी लोकांच्या मनात रुजतो. मला माहीत आहे की, विचार करणारी माणसं कमी असतात आणि बहुसंख्य समाजाचा चालत आलेल्या परंपरा पुढे चालू ठेवण्याकडेच कल असतो. कारण त्यात त्यांना सुरक्षितता वाटत असते.

जुन्या मूल्यांचा देखावा

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हळदीकुंकवासारख्या सणाच्या निमित्ताने अधिक जाणवतो. जागतिकीकरणानंतर लोकांची मानसिक अवस्था आणि मूल्यव्यवस्था बदलून गेली आहे. सगळीकडे बाह्य आवरणामधली अस्थिरता आहे. त्यामुळे जुनी जी मूल्य होती ती देखाव्याच्या स्वरूपात जाणवतात.

उदाहरणार्थ, लग्न एकदाच करतो असं म्हणत आई-वडील, मुलं- मुली वारेमाप खर्चाचा आग्रह धरतात. 25 हजारांची शेरवानी, पैठणी खरेदी करतात. भपकेबाजपणाचं त्यांना आकर्षण वाटत असतं. थोडक्यात काय तर गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या मूल्यसंस्कृतीला धक्का बसलाय. संस्कृतीचा जो गाभा होता त्याला स्पर्शही करायचा नाही, पण वरवर दिसेल अशी संस्कृती जपायची, देखावा करायचा. हा विरोधाभास आहे.

हळदीकुकवाचं राजकारण

त्यात राजकीय प्रचारासाठी स्त्रियांचा वापर होणं, यात नवल नाही. हळदीकुंकवाचे कार्यक्रम आज राजकीय अजेंडा राबवताना दिसतात. या राजकीय पुढाऱ्यांना फुले-आंबेडकरांचा समतेचा विचार पचणारा नाही.

मंदिरप्रवेशावर गेल्या वर्षी चर्चा होत असताना एक राजकीय महिला पुढारी म्हणाली, ‘महिलांना मंदिरात प्रवेश नसेल तर ती जुनी परंपरा आहे आणि ती पाळली गेली पाहिजे.’ तेव्हा मी जाहीरपण म्हटलं होतं- कित्येक वर्षं स्त्रियांना राजकारणात प्रवेश नाकारला गेला होता. पण तुम्ही परंपरा मोडलीच ना.

भेदाभेद नसणारा सण हवा

याचाच अर्थ असा की काही परंपरा लोकानुनयासाठी दाखवायच्या आणि काही सोयीने मोडायच्या. हा परंपरांच्या बाबतीतला विरोधाभासच आहे.

समतेचा विचार मानणाऱ्यांनी महिलांचा मेळावा घ्यावा. त्यात विधवांनाही सहभागी करून घ्यावं. हा विचार सोपा नाही. पंरपरेच्या विरोधातला आहे. मी अनेक मंडळांमध्ये भेदाभेद नको म्हणून आवाहन करते. पारंपरिक हळदीकुंकू नको पण मकरसंक्रांतीचा भेदाभेद नसणारा सण-समारंभ हवा.

लेखिका : सुश्री विद्या बाळ. 

(विद्या बाळ या ज्येष्ठ पत्रकार, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांनी बीबीसी  मराठीसाठी हा लेख लिहिला होता.) 

संग्राहिका : डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9767812692/9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “घड्याळ …” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? मनमंजुषेतून ?

☆ “घड्याळ …” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

जेवतांना सहज घड्याळाकडे लक्ष गेले. आजपर्यंतच्या आयुष्यात घड्याळ किती वेळा पाहिले हे मोजताही येणार नाही. पण आज पाहिले आणि घड्याळयाच्या तीन काट्यात आणि परिवारात काहीतरी साम्य जाणवले.

घड्याळ्यात तास काटा, मिनिट काटा, आणि सेकंद काटा असतो, तसेच परिवारातील तास काटा म्हणजे वडील, मिनिट काटा म्हणजे आई, व सेकंद काटा मुलं असल्याचे जाणवले. या प्रत्येक काट्याला फिरण्याची आपली गती आहे, प्रत्येकाची गती वेगळी आहे, पण दिशा मात्र एकच आहे. पण प्रत्येकाच्या गतीचे एक वर्तुळ पूर्ण झाल्याशिवाय सेकंद, मिनिटे, आणि तास पूर्णत्वास येवू शकत नाही.

परिवारात वडील म्हणजे तास काटा, याची गती सगळ्यात कमी असली तरीही तो एका ठाम गतीने व उद्देशाने पुढील तासाच्या आकड्याकडे सरकत असतो. पण तास पूर्ण झाल्याशिवाय त्याची गती लक्षातच येत नाही. त्याच प्रमाणे वडिलांचे काम असते. ते एक एक ध्येय डोळ्यासमोर ठेऊन ठामपणे आपला प्रवास करीत असतात. पण ते घरातल्या कोणालाच लक्षात नसते. ध्येय पुर्ण झाल्यावरच त्यांची गती लक्षात येते.

— वडिलांचे महत्व लक्षात येत नाही.

आई म्हणजे मिनिट काटा असते. प्रत्येक मिनिटाला (अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पर्यंत) तिची गती जाणवत असते. ती सतत चालत, विचारमग्न, आणि कार्यमग्न असते. मिनिट काटा जसा घड्याळ्यात फिरतांना कधी तास काट्याच्या मागे असतो, थोड्या वेळाने थोडा काळ तो तासकाट्याबरोबर थांबतो, व नंतर परत तास काट्याला मागे टाकून त्याची ओढ सेकंद काट्याकडे असते. अगदी तसेच आईचे असते. सतत कामात असतांना नवऱ्याच्या मागे पडल्यावर ती पुढे येऊन नवऱ्याला गाठून काही काळ नवऱ्याच्या बरोबरीने काम करते व नंतर परत मुलांचे सगळे करायचे आहे या प्रेमापोटी मुलांच्या (सेकंद काट्याच्या) मागे जाऊन त्यांच्या बरोबरीने राहण्याचा प्रयत्न करते.

आणि सेकंद काटा म्हणजे लहान मुलं. ती कितीही मोठी झाली तरीही आईवडीलांच्या मागे पुढे कायम उत्साहाने तुरुतुरु पळतांना, खेळतांना, बागडतांना दिसतात. ती सतत तास काटा आणि मिनीट काटा (वडील, आई) यांच्या मधेच धडपडतांना दिसतात. त्यांचा पुढे पुढे सरकण्याचा वेगही वडील आणि आई यांच्या पेक्षा जास्त असतो.

जसे घड्याळाला तीन काटे व त्यांच्या एकाच दिशेच्या गतीशिवाय पूर्णत्व येत नाही, तसेच अगदी आपल्या कुटुंबाचे आहे. या तीन काट्याप्रमाणे आपल्या कुटुंबातील वडील, आई,आणि मुलं या़ची गती एकाच दिशेनं असल्याशिवाय घराला पूर्णत्व येत नाही.

पण हे लक्षात ठेवा की सेकंद, मिनिटे, तास,  यामुळे दिवस, आठवडे, महिने, वर्षे,  हे पूर्ण झाले तरी यासाठी काटे आपली चौकट (घड्याळाची तबकडी) सोडत नाहीत —- तशीच आपण आपल्या कुटुंबाची चौकट सांभाळायला पाहिजे…..  एक जरी काटा चुकला तरी वेळ चुकते, तसेच कुटुंबातील एक जरी सदस्य (काटा) चुकला तर कुटुंबाचे घड्याळ बिघडून गोंधळ उडेल. 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पालवी… ☆ श्री संजय आवटे ☆

? मनमंजुषेतून ?

☆  पालवी… ☆ श्री संजय आवटे ☆

वसंताचा सांगावा घेऊन येणा-या चैत्राच्या पालवीचा धर्म कोणता? रणरणत्या वणव्यात बहरणा-या झाडांचा धर्म कोणता? ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ त्वेषाने फुलून येणा-या गुलमोहराचा धर्म कोणता?  

तरीही नववर्षाला धर्माशी जोडणारे जोडोत बापडे, आपला धर्म मात्र पालवीचा. आपला धर्म बहरण्याचा. आपला धर्म फुलून येण्याचा. हा धर्म ज्याला कळतो, त्यालाच झाडांची हिरवाई खुणावते, त्यालाच निळं आकाश समजतं. आणि, 

“चंद्रोदय नव्हता झाला, आकाश केशरी होते”, हा केशरी रंगही त्यालाच मोह घालतो ! 

परवा असंच तळेगावला जायचं होतं. ड्रायव्हर म्हणाला, ” सर, मामुर्डीचं जे चर्च आहे ना, तिथून पुढं गेलं की बुद्ध विहार आहे. तिथून सरळ पुढं जाऊ. तसे आलो, तर आयोजकांचा फोन आला- तळेगाव स्टेशनच्या जैन मंदिराकडं या. मग आपण पुढं जाऊ. आयोजक तिथं भेटले. गेलो, तर प्रत्यक्ष कार्यक्रम गणपती मंदिरात. तिथं शेजारीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा टुमदार बंगला. बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचा त्यांचा विचार इथंच अंतिम झाला, असं म्हणतात. अवघ्या दहा किलोमीटरच्या प्रवासात कुठं कुठं जाऊन आलो!  

हा भारत आहे. 

उद्यापासून रमजान सुरू होईल. 

पुण्याजवळच्या खेड शिवापूरला दर्गा आहे. हजरत कमर अली दुर्वेश रह दर्गा. रमजान आला की या गावातले सगळे कोंडे-देशमुख रोझे ठेवतात. एवढेच नाही, रमजानमध्ये, तिथल्या उरूसात देशमुखांचा मान असतो.

अशी कैक उदाहरणं देता येतील. 

भारताची ही गंमत आहे. 

हिंदुत्वाचं राजकारण करून थकलेल्या नेत्याला अखेर जावेद अख्तरांचा आदर्श जाहीरपणे सांगून नववर्ष साजरं करावं लागतं, ही खरी मजा आहे. जावेद यांनी पाकिस्तानात जाऊन बरंच सुनावलं, हे भारी आहेच. पण, भारतात राहून ते रोज काही सुनावत असतात. तेही ऐकावं लागेल मग ! कारण काहीही असो, पण हिंदू मतपेटीचं राजकारण करणा-यांना जावेद अख्तर सांगायला लागणं, असा ‘क्लायमॅक्स’ सलीम-जावेद जोडीला सुद्धा कधी सुचला नसता. 

पण, तीच भारताची पटकथा आहे ! 

साळुंब्र्याच्या प्राथमिक शाळेपर्यंत चालत चालत आलो. तर, पोरं ‘ खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे ‘, ही साने गुरूजींची प्रार्थना म्हणत होती. 

वाटलं, हे वेगळं सांगण्याची गरजही भासू नये, इतकं भिनलेलं आहे ते आपल्या मनामनात. इतकं नैसर्गिक आहे हे. अर्थात, उगाच नाही उगवलेलं हे. त्यासाठी मशागत केलीय आमच्या देहूच्या तुकारामानं. आळंदीच्या ज्ञानेश्वरानं. कबीरानं. त्याहीपूर्वी बुद्धानं. म्हणून तो वारसा सांगत आज ही पोरं प्रेमाचा धर्म सांगू शकताहेत. 

या प्रेमाच्या धर्मावर आक्रमण करणारे मूठभर प्रत्येक काळात असतात. त्यांचा विजय झाला, असं काही काळ वाटतंही. पण, युद्ध संपतं. बुद्ध मात्र उरतो. मंबाजी संपतो, तुकोबा उरतो. शेणगोळे विरतात, सावित्री-ज्योतिबा उरतात. 

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। 

भेदाभेद-भ्रम अमंगळ॥ 

हाच धर्म अखेरीस जगज्जेता ठरतो. 

आपण चालत राहायला हवं, या पोपटी पालवीकडं पाहात. जोवर ही पालवी येते आहे, तोवर निसर्गानं आशा अद्याप सोडलेली नाही, हे नक्की आहे ! 

तुम्ही का सोडता? 

© श्री संजय आवटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वाचणाऱ्या मना .. जरा थांब ना… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ वाचणाऱ्या मना .. जरा थांब ना… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ 

तुमच्याबाबतीत असं कधी घडलं आहे का, की आपण आवर्जून एखादं पुस्तक वाचायला घेतो. बसल्या बैठकीत वाचून काढायचं असं पण मनाशी ठरवतो. उत्साहात १००-१५० पानंसुद्धा वाचून झालेली असतात. मध्येच काही कारणाने खंड पडतो आणि तेवढ्यातच दुसरं एखादं नवीन आपणच मागवलेलं पुस्तक आपल्या पुढ्यात येतं. झालं! आता नवीन पुस्तकानं आपलं मन वेधलेलं असतं. त्यात काय असेल ते वाचण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नसते. मन अगदी उतावीळ होतं‌. मन काय आपल्या प्रत्येक गोष्टीचं समर्थन करायला तयारच असतं. लगेच बहाणा शोधतं.‌ आता या पुस्तकात इतकं वाचून झालंय तर थोडा ब्रेक घेऊया म्हणजे पुढचं वाचताना नवं काही सापडेल का ते पाहता येईल, त्याच्यावर चिंतन करता येईल. आणि मग परिचय लिहिताना आपल्याला काही अवांतर मुद्दे सुचतील. सतत एकाच विचारानंं सगळं वाचण्यानं, वाचताना पण मोनोटोनस झाल्यासारखं वाटतं. तसं न वाटता प्रत्येक पान फ्रेश विचारातून वाचलं गेलं पाहिजे. म्हणजे मग पुस्तक आपल्याला खऱ्या अर्थाने उमगेल वगैरे वगैरे. 

असा विचार करून पुढ्यात आलेलं नवं पुस्तक थोडं वाचूया म्हणून ते उत्साहाने हातात घेतलं जातं. पाहता पाहता आपण त्याच्यामध्ये रमून जातो. त्याचीही शंभर एक पानं होतात. आपण ठरवलेलं टार्गेट बऱ्यापैकी पूर्ण करत आलेलो असतो पण ते ठरवलेल्या पुस्तकाबाबत नव्हे. कालांतराने दोन्ही पुस्तकं सारखीच प्रिय होतात आणि मग कुठलं पूर्ण करावं यावर मनात द्वंद्व सुरू होतं. 

पहिल्या पुस्तकातल्या एखाद्या पात्रानं मनावर पकड घेतलेली असते आणि त्याचवेळी दुसऱ्या पुस्तकातल्याही एखाद्या पात्रानं मनावर पकड घ्यायला सुरुवात केलेली असते. आता मनाच्या आणि पात्रांच्या आपसातल्या युद्धात कुठलं पुस्तक विजयी ठरणार हे आपल्याला समजत नसतं. अशावेळी नाईलाजानं जास्त ताण घेऊयात नको म्हणून दोन्हीही पुस्तक बाजूला ठेवली जातात. आणि या आधीच वाचून काढलेलं ज्याच्यावर चिंतन, मनन वगैरे सगळं करून झालं आहे असं तिसरंच पुस्तक आपण हाती घेतो. 

पण आता हे तिसरं पुस्तक वाचताना आपलं मन त्याच्यात अजिबात गुंतलेलं नसतं. आधीच्या दोन्ही पुस्तकांतली आपल्याला आवडलेली दोन्ही पात्रं या तिसऱ्याच पुस्तकात मध्येच डोकावत असतात आणि आपली स्वतःची वेगळीच गोष्ट घुसडण्याचा प्रयत्न करतात. हे लक्षात आल्यावर आपण ते तिसरं पुस्तक निमूटपणे बाजूला ठेवतो. 

या सगळ्या गडबडीत दिवस संपून जातो. खरी मजा  झोपताना येते. आपल्या दोन्ही अर्धवट राहिलेल्या पुस्तकांची कथा आता सतावत असते. एखाद्या पात्राचा उत्कंठावर्धक प्रवास तर दुसऱ्या पात्राचा गुढ प्रवास उलगडायचा राहिलेला असतो. एखाद्याचा तरी प्रवास पुढे नेऊयात म्हणून आपण अर्धवट झोपेत अर्धवट जागेपणी ते पुस्तक दामटून वाचायला घेतो. वाचता वाचता दोन्ही पुस्तकातली पात्रं वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये घुसून आपली तिसरीच गोष्ट निर्माण करतात. 

‘टार्गेट असद शाह’ आणि ‘द हिडन लाईफ ऑफ ट्रीज’ या दोन पुस्तकांतील पात्रं एकमेकांच्या दुनियेत शिरली आणि त्यांनी प्रचंड धमाल केली. टार्गेट असद शाह मधल्या कबीरनं ‘मायसेलियम’ म्हणजे झाडांच्या बुरशीच्या जाळ्याच्या सहाय्यानं इंटरनेटवरून गम्बोला अरबाज़च्या ठिकाणाविषयी माहिती दिली. आणि त्याला पाइनच्या जंगलात पकडलं. अरबाज़ जंगलात आला तेव्हा जंगलातल्या सर्व वृक्षांनी एक विषारी वायू जंगलात सोडला आणि त्यामुळे तिथे लपलेल्या कवचकुंडलच्या आर्मी ऑफिसर्सना त्याचा पत्ता लागला. असं बऱ्यापैकी भन्नाट कथानक तयार झाल्यावर आपण गुंगीत असलो तरी नंतर लक्षात येतं आपण काहीतरी भलतंच वाचतोय आपल्याला जे वाचायचंय ते हे नाही. अजून एक दोनदा प्रयत्न केला जातो पण तसंच घडायला लागल्यावर मग निमुटपणे हातातलं पुस्तक बाजूला ठेवून दिलं जातं आणि आपण झोपेच्या स्वाधीन होतो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी उठता क्षणी आपल्या टेबलवर पडलेली ती दोन पुस्तकं आपलं टार्गेट पूर्ण होण्याच्या दृष्टीने आपल्याकडे अतिशय आशेने पाहत असतात आणि त्यावेळी पुन्हा मनात आज यापैकी कुठलं निवडावं याचं द्वंद्व सुरू होतं.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘एक असते चिमणी’ – डाॅ.केशव साठ्ये ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

??

☆ ‘एक असते चिमणी’ – डाॅ.केशव साठ्ये ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

मध्यंतरी सातारला गेलो होतो. हॉटेलची खिडकी सहज उघडली तर समोर २,३ चिमण्या, अगदी दोन फूटांवर. हरखून पहात बसलो. खरं सांगतो, पहिल्यांदा मोर बघितला तेव्हाही एवढा आनंद झाला नव्हता. आता ‘चिमणी’ हा पक्षी पुण्यात पाहायला मिळणे दुर्लभ झालंय. निदान आमच्या कोथरुडमध्ये तरी. 

चिमणी ही आपली लहानपणापासूनची सखी आहे. आम्ही फलटणला राहत होतो, पहिल्या मजल्यावर. तिथे मोठे माळवद (पाऊस कमी होणाऱ्या प्रदेशात माळवदी घरे असतात) होते. असंख्य चिमण्या तुरुतुरु चालत पुढ्यात यायच्या. टाकलेले दाणे, पदार्थ ऐटीत टिपायच्या आणि भुर्र उडून जायच्या. चिमणी हा घरातलाच सदस्य आहे, अशी भावना माझ्यासारख्या लाखोजणांची असेल. किंबहुना चिमणी हा आपल्या जगण्याचा एक भागच झाली होती. तिला वेगळे तरी कसे करणार? 

राखाडी, भुरा रंग, प्रमाणबद्ध शरीर, इवलीशी चोच, टुक टुक पाहणारे डोळे, न घाबरता, बिनधास्त पुढ्यात येऊन बसायच्या. पण हे चित्र गेल्या १०, १५ वर्षांत झपाट्याने बदलले. चिमण्या दिसेनाश्या झाल्या. त्यांची जागा कबुतरांनी, पारव्यांनी घेतली. आजही कुणी खेड्यात, थोड्या दुर्गम भागात गेला आणि त्यांनी चिमणी पाहिली असे सांगितले की, मन त्या रम्य आठवणीने भरुन येते. 

‘या चिमण्यांनो परत फिरा’ सारखे गाणे लागले, किंवा बाळ जेवावे म्हणून एखादी आई ‘हा घास चिऊचा’ असे म्हटलेले ऐकले, की अधिकच गलबलून येते. आपल्या आयुष्यातील अनेक जुन्या गोष्टी स्मरणरंजनाच्या कप्प्यात जाऊन बसल्यात. त्यातच ही पण जाऊन बसली. हे दुःख आपल्या सर्वांचेच आहे आणि त्यात भर म्हणजे आता ती नसण्याचा दिवसही आपण साजरा करायला लागलोय.

त्यामागे हेतू चांगला असला तरी तिचे नसणे अशा दिवसाने अधिक ठसठशीत होते. अर्थात आपण आपली कातडी टणक करुन टाकलीय म्हणा. एक असते चिमणी… एक असतो कावळा… कावळ्याचं घर असतं शेणाचं, चिमणीचं घर मेणाचं. धो-धो पाऊस पडतो, कावळ्याचं शेणाचं घर वाहून जातं.. ही लहानपणी ऐकलेली गोष्ट खोटी ठरली म्हणायची. कारण कावळे बहुसंख्य दिसतात. म्हणजे चिमणीचं घरच वाहून गेले म्हणायचे.. 

आज जागतिक चिमणी दिवस (२० मार्च), त्या निमित्त…

लेखक : डॉ. केशव साठये

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “शब्दांचे जीवनचक्र…” लेखक – डाॅ. श्रीकांत तारे  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “शब्दांचे जीवनचक्र…” लेखक – डाॅ. श्रीकांत तारे  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

माणसांप्रमाणे शब्दांचेही जीवनचक्र असते. शब्द जन्माला येतात,जगतात व शेवटी मरुन जातात. काही शब्द शतायुषी माणसाप्रमाणे पिढ्‌यान पिढ्‌या सन्मानाने जगतात. काही शब्द अल्पायुषी ठरतात, तर काही शब्द उगाचच श्वास चालला आहे म्हणून जिवंत म्हणवले जातात, एरवी त्या शब्दांकडे सहसा कुणी लक्षही देत नाही.

‘वरवंटा’ हा शब्द असाच काही दिवसांपूर्वी वारला. त्यापूर्वी तो बरेच वर्ष मरणपंथाला लागला होता सुरुवातीला लोक त्याची विचारपूस करायचे. वीज नसल्यामुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे मिक्सर आजारी पडलं की लोक वरवंट्‌याकडे वळायचे. तोही बिचारा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यासारखा जबर दुखण्यातून उठून लोकांना मदत करायचा. ‘वरवंटा’ हा शब्द लोकांना अधून मधून का होईना, आठवायचा. 

महिन्यापूर्वीच, मराठीत एम फिल केलेल्या माझ्या भाचीला मी वरवंटा शब्दाबद्दल विचारल्यावर तिने  ‘पांडोबा भिकाजी धावडे’ अश्या तद्दन अनोळखी नावाच्या माणसाच्या गडचिरोली येथे निधनाची बातमी ऐकून आपण जसा चेहरा करु तसा चेहरा केला तेव्हाच या शब्दाचं आयुष्य संपल्याची जाणीव मला झाली.  

असं कितीतरी शब्दांच्या बाबतीत झालं. ‘आपला खल दिसत नाही आजकाल कुठे?’ असं मी बायकोला विचारलं तर तिनं ‘खल गेला आटाळ्यात आणि खलनायक माझ्यासमोर उभा आहे’ असं शेलक्या शब्दांत उत्तर दिलं. काहीही कमेंट्‌स न करता मी मनातल्या मनांत खल या शब्दाला श्रध्दांजली देऊन टाकली.

कोट हा मराठी शब्द कुठल्यातरी शेवटल्या राजाबरोबर सती गेला असावा. क्ल्ल्यिांभोवतीचे कोट जाऊन तिथे भिंती उभ्या राहिल्या आणि त्या किल्ल्यांचे म्यूझियम झाले. तसेच ‘बाराबंदी’ तुकोबांसह सदेह स्वर्गात गेली, ती पुन्हा परतलीच नाही. बुवांच्या जाण्याबद्दल वादविवाद झडताहेत पण बाराबंदी निश्चितच कायमची स्वर्गवासी झाली याबद्दल मार्क्सवाद्यांपासून ते संघवाल्यांपर्यंत सर्वांचंच एकमत झालेलं दिसून येतं.

‘उमाळा’ या शब्दाची कालपरवाच हत्या झाली असं कळलं. एका, प्रथमच सासरी जाणाऱ्या मुलीनं, टीपं गाळणाऱ्या आपल्या आईला, ‘रडतेस काय असं गांवढळासारखं?’ असं कडक शब्दांत विचारलं, तेव्हाच उमाळयाचं ब्रेन हॅमरेज झालं. टीव्हीवरच्या उसनं रडं आणणाऱ्या मराठी हिंदी मालिका बघून भावनांची धार गेलेल्या माणसांनी हळू हळू उमाळयाचा ऑक्सिजन पुरवठा तोडला आणि त्याला सपशेल मारून टाकलं. खरं तर प्रेमाचा उमाळा जाऊन प्रेमाचं प्रदर्शन आलं तेव्हाच त्याने प्राण सोडायला हवा होता, पण तोही बेटा एका पिढीला साथ  देण्याचे वचन  निभावत असावा. आता राजे, ती पिढीही गेली आणि तो उमाळाही न जाणे कुठल्या अनंतात विलीन झाला. 

माझ्या आजोबांकडे एक जुनी चंची होती. त्यात ते पान, सुपारी वगैरे ठेवायचे. आजोबा जाऊनही आता तीस बत्तीस वर्षे झाली असावीत. माझा आतेभाऊ आठवड्‌यापूर्वी कुठल्याश्या लग्नांत भेटला, तेव्हा मी त्याला, ‘नानांची एक नक्षीदार चंची होती, आठवतंय?’ असं विचारल्यावर त्याने माझ्याकडे, जणू मी त्याला न्यूक्लीयर बॉम्बबद्दल विचारतो आहे अश्या नजरेनं बघितलं. चंची हा शब्दच त्याच्या मेंदूतून पार धुवून निघालेला दिसत होता. कहर म्हणजे लगेचच माझ्या बायकोनं माझा दंड धरला आणि मला बाजूला घेत ‘नानांच्या लफड्‌यांबद्दल असं चार लोकांसमोर काय बोलता?’ म्हणत मला झापलं. मी मनातल्या मनांत लागलीच ‘चंचीच्या दुखःद देहावसनाबद्दल शोक बैठक दिनांक…’ वगैरे शब्दांची जुळवणी करु लागलो. 

असाच एक शब्द काही दिवसांपूर्वी नैसर्गिक मृत्यू पावला. ‘फुलपात्र’  हा तो शब्द. ही वस्तू अजून शिल्लक आहे, पण हा शब्द मेला. हे म्हणजे एखाद्या मेलेल्या प्राण्याला पेंढा भरून दिवाणखान्यात सजवून ठेवल्यासारखं वाटतं. मग तो नुसता ‘प्राणी’ न राहता, ‘पेंढा भरलेला प्राणी ‘ होतो. फुलपात्र या शब्दाचं असंच झालं. याला सुटसुटीत नाव ‘पेला’ किंवा सर्वनाम ‘भांडं’ असं मिळालं. फुलपात्र या नावाच्या अंत्ययात्रेला या दोन्ही शब्दांनी त्याला उत्तराधिकारी म्हणून खांदा दिला असावा. तसंच आपल्या आवडीचा पदार्थ त्याच्या नावासकट नेस्तनाबूत होताना पहाणे हाही एक शोकानुभव असतो.

 मी लहानपणी कल्याणला शिकत असताना छाया थियेटर जवळच्या एका म्हाताऱ्या वाण्याकडून जरदाळू घेऊन खायचा. जरदाळू खाल्ल्यावर त्यातली बी फोडून त्याच्याही आतला गर खाण्यात गंमत वाटायची. नेमानं मी सात आठ वर्ष त्याच्याकडून घेऊन जरदाळू खात होतो. कल्याण सोडल्यानंतर मी तीसेक वर्षाने सहज म्हणून आमची जुनी चाळ बघायला गेलो, तेव्हा सगळंच बदललं होतं. वाण्याचं दुकानही बऱ्यापैकी पॉश  झालेलं होतं, गल्ल्यावर चिरंजीव वाणी बसले असावे. मी त्याच्याकडे जरदाळू मागितला, आणि वाणीपुत्राला घाम फुटला. ‘ऐसा माल हम नही बेचते’ असं जेव्हा तो बोलला, तेव्हा हा शब्दच त्याने ऐकलेला नसल्याचं मला जाणवलं. मी जरा जोर दिल्यावर तो घाबरलाच, तो मला सीबीआय चा माणूस समजला असावा. त्याने मला आंत बसवून मागवलेलं कोल्ड्रींक पीत मी जरदाळू या शब्दाच्या आणि या सर्वांगसुंदर सुकामेव्याच्या आठवणी दोन अश्रू ढाळले. 

ग्रूपमध्ये असंच गप्पा मारीत असता कुणीतरी ‘भारतीय हॉकीचं विंधाणं झालं’ असं म्हटलं आणि मला जुना मित्र भेटल्याचा आनंद झाला. ‘विंधाणं’ हा शब्द गेले कित्येक वर्ष गहाळ झाला होता. उलट सुलट चर्चा चालू असतां अचानक तो मला गवसला. या नकारात्मक शब्दाच्या शोधात मी पणती घेवून फिरत होतो अश्यातला भाग नाही, पण नकारात्मक असला तरी तो एक शब्द होता, टिपिकल मराठी शब्द. वर्षानुवर्षे आपल्याला साथ देणारा, आपल्या भावना इतरांपर्यंत पोहोचवणारा चपखल शब्द. आणि एखादा शब्द मेल्याचं दुखः त्याच अर्थाच्या दुसऱ्या शब्दाच्या जन्माने भरुन नाही निघत. 

एक शब्द नाहीसा झाल्याने मात्र मी खरंच बेचैन झालो. तो शब्द माझ्या फारश्या जवळचा नव्हता, किंबहुना त्याची माझी भेट माझ्या प्राथमिक शिक्षणानंतर पडलेली मला आठवत नाही, पण तो शब्द वारल्याचं कळलं,आणि आपली संस्कृती बदलत चालली आहे हे मला प्रकर्षाने जाणवलं. तो शब्द म्हणजे ‘औत’. लहानपणापासून तो माझा आवडता शब्द होता. आजकाल त्याचा भाऊ नांगर त्याचे काम पहातो, पण औत म्हटल्यावर जो सुखी समाधानी शेतकरी डोळयासमोर यायचा, तोच शेतकरी नांगर धरल्यावर न जाणे का, केविलवाणा दिसू लागतो. काही काळापासून, द्रॅक्टर नांवचा नवीन शब्द आलाय, पण तो ‘कर्ज’ या शब्दाला आपल्याबरोबर घेऊन आलाय.

कितीतरी शब्द माझ्या डोळ्यादेखत नाहीसे झाले. काही कायमचे गेले तर काही, आयुष्य संपण्याची वाट पहात पडलेले आहेत. फळा आणि खडू या दोघांनी तर बरोबरच जीव दिला. त्यांच्या प्रॉपटीवर बोर्ड आणि चॉक यांनी हक्क मांडल्यावर त्यांना दुसरा इलाजच राहिला नाही. तुळई गेली, रोळी गेली, किरमिजी नावाचा रंग गेला, लिंगोरचा गेला, पाचे गेले, दांडपट्टा गेला, गेलेल्या शब्दांची यादी एखाद्या गावांत वारलेल्या माणसांच्या नांवच्या यादीएवढी लांब असू शकते, याला अंत नाही. यांच्या जागेवर नवनवे शब्द येतातही, पण त्यांना म्हणावी तशी लोकमान्यता मिळत नाही. संगणक हा शब्द गेल्या काही दिवसांपासून स्थापित होण्याचा प्रयत्न करतोय, पण एखाद्या नवरीचे नाव लग्नानंतर बदलले गेले तरी तिला माहेरच्याच नावाने ओळखले जावे, तसं काहीसं संगणक या शब्दाच्या बाबतीत घडलंय.

इंग्रजी शब्द तणांसारखे माजू लागल्यावर आणि त्यांचा मराठीत मुक्त संचार सुरु झाल्यावर तर पुढे पुढे आपण मराठी व्याकरणांतून इंग्रजी बोलत आहोत असा देखावा निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘माझे फोर्टी फाईव्हचे अंकल मॉर्निंग वॉक घेत होते तर त्यांची  हार्टफेलने डेथ  झाली.’  हे वाक्य एका पुण्याच्या मराठी मुलीच्या तोंडून ऐकल्यावर मी जाम गोंधळलो होतो. या वाक्याची नेमकी भाषा कुठली हेच मला कळेना. ‘सांगणाऱ्याला सांगता येते आणि ऐकणाऱ्याला कळते ती खरी भाषा’ अशी भाषेची नवीन व्याख्या जरी मी निर्माण केली, तरी वरील वाक्य निश्चित कुठल्या वर्गात ठेवायचं, हा प्रश्न माझ्याकडून  आजतागायत सुटलेला नाही. 

शब्द माझे सखा आहेत, बंधू आहेत, आई आणि वडील देखील आहे. शब्दांवर मी प्रेम केलं आणि मोबदल्यांत शब्दांनी मला त्यांचे सर्वस्व दिलं. मी शब्दांनी घडलो, वाढलो. त्यांचे मरण उघड्‌या डोळयांनी पहाण्याचे दुखः मी आज सोशित आहे.

लेखक : -प्रा डॉ श्रीकांत तारे

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मी देव पाहिला….” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? मनमंजुषेतून ?

☆ “मी देव पाहिला….” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

एका भयाण रात्री मंदिराच्या पायरीवर लाईटच्या उजेडात एक  साधारण पंधरा वर्षाचा एक मुलगा अभ्यास करताना पाहिला. थंडीचे दिवस होते. कुडकुडत होता पण वाचनात मग्न होता. 

हप्त्यातून दोनदा त्या रस्त्याने मी जात असायचॊ. दिवसा कधी दिसत नसायचा. खूप जिज्ञासा होती त्या मुलाबद्दल जाणण्याची. 

एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो. मनात आलं तो मुलगा जर तिथे असेल तर त्याच्यासाठी काहीतरी पार्सल घेऊन जाऊ. रात्रीचे साडेबारा वाजले असतील. मी त्या मंदिराकडे आलो, तर तो मुलगा नेहमीप्रमाणे मंदिराच्या पायरीवर अभ्यास करतांना दिसला. 

मी गाडी थांबवली. त्याच्या जवळ गेलो. मला बघून तो गालातल्या गालात हसला. जणू माझी त्याची जुनी ओळख असावी. 

मी म्हणालो, “ बाळ तू रोज इथे बसून का अभ्यास करतोस? “ 

“ सर माझ्या घरात लाईट नाही. माझी आई आजारी असते. दिव्यात रॉकेल घालून अभ्यास  करायला माझी ऐपत नाही.” 

“ बाळ तू मला बघून का गोड हसलास ? “ 

“ सर तुम्ही देव आहात !” 

“ नाही रे! “ 

“ सर तुम्ही माझ्यासाठी देवच आहात. “ 

“ ते जाऊ दे. तू जेवलास का? मी तुझ्यासाठी खाऊचं पार्सल आणलं आहे. “ 

“ सर म्हणूनच मी हसलो. मला माहित होतं. तो  देव कोणत्याही रूपात येईल, पण मला भुकेलेला नाही ठेवणार. मी जेव्हा जेव्हा भुकेलेला असतो, तो काहीना काही मला देतोच. कधी नवसाचे पेढे तर कधी फळ तो मला देऊन जातो. आज मी भुकेलेला होतो पण निश्चिंत होतो. मला माहित होतं….तो काहीतरी कारण करून मला भेटायला येणार आणि तुम्ही आलात. तुम्ही देव आहात ना !” 

मी निःशब्द झालो, नकळत माझ्याकडून पुण्याचं काम घडलं होतं. रोज कर्जाच्या ओझ्याखाली दबताना देवाला कोसत होतो. त्याने आज मला देवाची उपाधी देऊन लाजवलं होतं.

 त्याने तो अर्धवट खाऊ खाल्ला आणि म्हणाला, “ सर तुम्ही इथेच थांबा. मी अर्धं माझ्या आईला देऊन येतो.” 

…. माझे डोळे तरळले. त्याला काही विचारण्याअगोदरच त्याने सारं काही कृतीतून सांगितलं होतं. 

तो पाच मिनिटांनी परत आला. त्याच्या ओंजळीत पारिजातकाची फुलं होती. 

“ सर, माझी आई सांगते, ज्या परमेश्वराने आपल्या पोटाची खळगी भरली त्याच्या चरणी ओंजळभर फुलं तरी वहावीत.” 

…. क्षणभर डोळे बंद केले आणि त्या बंद दारातल्या पाषाणाकडे पाहिलं, तर तेही मला त्या मुलाच्या गोड हसण्यासारखं वाटलं. 

नंतर कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन झालं. शाळा, कॉलेज, मंदिर बंद झाले. देवळं ओस पडली. देवळांना कुलूप ठोकली आणि रस्त्यावर  शुकशुकाट झाला.

अशीच एके दिवशी त्या मुलाची आठवण झाली आणि मुद्दाम त्या देवळाकडे डोकावलं. रात्रीची वेळ होती.

देवळाच्या पायरीवरील लाईट बंद होती आणि तो मुलगा कुठेच दिसला नाही. वाईट वाटलं मला.  

‘ या महामारीत कुठे गेला असेल हा मुलगा ? काय खात असेल ? कसा जगत असेल ?’ असे नाना प्रश्न आ वासून उभे राहिले. 

कोरोनाच्या महामारीत असंख्य लोकांनी प्राण गमावले. असाच आमचा एक मित्र पॉझिटिव्ह होऊन दगावला. मी त्याच्या अंत्यसंस्काराला स्मशानात गेलो होतो. अंत्यसत्कार झाले. सर्व आपल्या घरी निघाले. 

निघताना हात पाय धुवावे म्हणून शंकराच्या मंदिराशेजारील नळावर गेलो. पाहतो तर तो मुलगा नळावर स्मशानात टाकलेले प्रेतावरचे सफेद कपडे  धुऊन त्या स्मशानाच्या भिंतीवर वाळत टाकत होता. 

मला बघून त्याने आवाज दिला, 

“ सर …. “

“अरे तू इथे काय करतोस ? “

“ सर आता मी इथेच राहतो. आम्ही घर बदललं. भाडं भरायला पैसे नव्हते. त्यातच लॉकडाऊनमध्ये शिव मंदिर बंद झालं आणि पायरीवरची लाईटही बंद झाली. मग मला घेऊन आई इथे आली. काही झालं तरी शिक्षण थांबता कामा नये असं तिनं सांगितलं आहे. त्या शिवमंदिराचे दरवाजे बंद झाले, पण ह्या शिव – मंदिराचे दरवाजे कधी बंद होत नाहीत. तिथे जिवंत माणसं यायची आणि इथे मेलेली….. ह्या लाईट खाली माझा अभ्यास चालू असतो….. सर मी हार नाही मानली. आई सांगायची……..‘ ज्याने जन्म दिला तोच भुकेची खळगी भरणार.’ 

“ बरं….. तुझी आई कुठे आहे ? “

“ सर ती कोरोनाच्या आजारात गेली. तीन दिवस ताप खोकला होता. नंतर दम अडकला. मी कुठे गेलो नाही. इथे पडलेल्या तुटक्या, अर्ध जळलेल्या लाकडांनी तिला अग्नी दिला. १४ दिवस इथंच ह्या खोपीत होम क्वाँरनटाईन राहिलो … ‘ सरकारी कायदा मोडू नकोस, तो आपल्या भल्यासाठी असतो,’  असं ती सांगायची. आईच्या अस्थी समोरच्या नदीत विसर्जित केल्या आणि काल इथल्या स्मशानातल्या अग्नी देणाऱ्यांना जेऊ घातलं आणि आईच क्रियाकर्म आटपलं……. सर तरी मी हरलेलो नाही. पण दुःख एव्हढच आहे की मी पास झालेलो पहायला आई ह्या जगात नाही. ती जिथे ज्या जगात असेल तिथे खूप खुश असेल हे माझं यश बघून…   कालच माझा रिजल्ट लागला आणि मी शाळेत पहिला आलोय. आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे शिक्षक करणार आहेत…  पण आता तर खरी अडचण उभी राहिलीय. ऑनलाईन अभ्यास करायला माझ्याजवळ मोबाईल सुद्धा नाही….. असो . सर, तुम्ही का वाईट वाटून घेता ? तुम्हाला मी पास झाल्याचा आनंद नाही झाला ? सर, तुम्ही कुठे जाऊ नका, इथेच थांबा. “ 

.. त्याने छोट्याशा डब्यातून साखर आणली होती. चिमूटभर  माझ्या हातावर ठेवली. 

“ सर तोंड गोड करा. “ 

तो डबा ठेवायला त्या खोपीत गेला तोवर मी माझ्या तोंडावर त्या नळाचं पाणी मारून भानावर आलो.

भरलेले डोळे लपवण्यासाठी तोंड धुतले.

“ सर, मला माहीत होते, देव या जगात आहे आणि तो माझ्या आनंदात माझी पाठ थोपटायला नक्की येणार.”  

… त्याने पुढे काही बोलण्याअगोदरच मी नुकताच घेतलेला माझ्या खिशातला माझा नवा मोबाईल त्या मुलाच्या हातावर टेकवला आणि त्याची पाठ थोपटून निमूटपणे बाय करून स्मशानाबाहेर चालू लागलो. 

आता दर महिन्याला मी त्याचा मोबाईल रिचार्ज करतो……न सांगता. 

खरा देव तर कधीच नाही दिसला पण …. मी त्या मुलाच्या डोळ्यात देव पाहिला. ….

देव पाहिला….

लेखक – अज्ञात 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सुंदरता… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ सुंदरता… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

स्त्रियांना नेहमी असं वाटतं की, 

आपण हे नेसल्यावर सुंदर दिसू, ते घातल्यावर सुंदर दिसू. 

एक जाहिरात आहे, त्यात विनोदकन्या भारती म्हणते, “ मुझे कभी ब्यूटिफुल बनना ही नहीं था, क्यों कि मैं हमेशा से जानती थी की मैं ब्यूटिफुल हूँ. सिर्फ अपनी सुंदरता को मेन्टेन करती हूँ। “ 

फार छान ओळी आहेत या कि, मला नेहमीच माहीत होतं, मी सुंदर आहे.

आपल्यापैकी किती जणींना हे माहीत असतं?

आपल्यातलं सौंदर्य कशात आहे, हेच आपल्याला माहीत नसतं. कारण सौंदर्य म्हणजे काय, हेच आपल्याला कळत नाही. 

आपले सौंदर्याचे आणि प्रेमाचे मापदंड आपण लहान किंवा मोठ्या पडद्यावरच्या तारकांकडे पाहून ठरवत असतो.

जाहिरातीतल्या बाईचा मेकअपने झाकलेला हजार वॅटमध्ये चमकणारा चेहरा म्हणजे आपण सौंदर्य समजतो. पाठ उघडी टाकणारं प्रचंड मोठ्या गळ्याचं ब्लाउज म्हणजे सौंदर्य समजतो.

पण तुम्ही कधी आपल्या बाळाला पाजताना स्वत:चा चेहरा पाहिलाय का? वात्सल्यानं चमकणाऱ्या त्या चेहऱ्याचं सौंदर्य उजळण्यासाठी कधीच हजार वॅटच्या फोकसची गरज लागत नाही. 

दिवसभर घरकाम करून थकल्यावर संध्याकाळी तोंडावर पाणी मारून साध्या टॉवेलने पुसलेला चेहरा पाहिलाय का? त्यावरचे स्वत:च्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्यामुळे येणारे कर्तव्यपूर्तीचे भाव किती सुंदर दिसतात, ते कधी न्याहाळलेत का? 

सकाळी उठून सडा-रांगोळी झाल्यावर स्वत:च काढलेली रेशीमरेषांची रांगोळी पाहिली तर तुम्हाला तुमच्या बोटातली सुंदरता दिसेल. 

स्वच्छ-सुंदर आवरलेलं स्वयंपाकघर तुम्हाला तुमच्या गृहिणीपणाचं सौंदर्य सांगेल.

तुम्ही शिक्षिका असाल तर तुमचं सौंदर्य फळ्यावर नीटपणे लिहिलेल्या अक्षरात आहे. विषयाचं आकलन झाल्यावर दिसणारे मुलांचे आनंदी चेहरे ही तुमची सुंदरता आहे. 

तुम्ही इंटिरिअर डेकोरेटर असाल तर तुम्ही सजावट केलेल्या जागेतून तुमचं सौंदर्य डोकावेल. 

तुम्ही संपादक असाल तर तुम्ही निवडलेले लेख आणि त्यांची सुबक मांडणी तुमचं सौंदर्य आहे. 

तुम्ही विणलेल्या भरघोस गजऱ्यात तुमचं सौंदर्य आहे. तुम्ही काढलेल्या अक्षरात तुमचं सौंदर्य आहे.

सौंदर्य कपड्यात नाही, कामात आहे.

सौंदर्य नटण्यात नाही, विचारात आहे. 

सौंदर्य भपक्यात नाही, साधेपणात आहे.

सौंदर्य बाहेर कशात नाही, मनात आहे.

आपण करत असलेलं प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचं सादरीकरण असतं. आपल्या कृतीतून सौंदर्याची निर्मिती करता आली पाहिजे.

प्रेमाने बोलणं म्हणजे सुंदरता, 

आपलं मत योग्य रीतीनं व्यक्त करता येणं म्हणजे सुंदरता.

नको असलेल्या गोष्टीला ठाम नकार देण्याची हिंमत म्हणजे सुंदरता. 

दुसऱ्याला समजावून घेणं म्हणजे सुंदरता.

आपल्या हाती आलेला प्रत्येक क्षण रसरशीतपणे जगण्यात खरी सुंदरता आहे. 

आपल्या वर्तनातून, विचारातून आपलं सौंदर्य बाहेर येऊ द्या.

मेरी कोमचं सौंदर्य तिच्या ठोशात आहे. इंदिरा गांधींचं सौंदर्य कणखर निर्णयक्षमतेत राहिलं आहे. 

आपण करत असलेल्या कामात कौशल्य प्राप्त झालं की, आत्मविश्वास मिळतो. आत्मविश्वास आला की, आत्मसन्मानाची जाणीव येते. अशी आत्मविश्वासाने जगणारी बाई आपोआप सुंदर दिसते. 

गौरवर्ण, सडपातळ बांधा, काळे-दाट केस या वर्णनातून आता बाहेर पडलं पाहिजे. त्याऐवजी असेल तो वर्ण, दणकट बांधा, सुदृढ मन आणि संतुलित विचार या मापदंडाचा विचार करून पाहूया. 

तुम्ही जशा जन्माला आल्या आहात तशाच सुंदर आहात, 

ही खूणगाठ मनाशी बांधून टाका. 

जशा आहात तशाच अगदी सुंदर आहात, याची खात्री बाळगा. 

आपल्यातील सुंदरता ओळखून स्वत:वर विश्वास ठेवायला शिका. 

म्हणजे आपलं सौंदर्य अजूनच खुलेल. 

लेखक – अज्ञात

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “प्राजक्त…” लेखक – अज्ञात ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “प्राजक्त…” लेखक – अज्ञात ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

झाडावरुन प्राजक्त ओघळतो, 

त्याचा आवाज होत नाही, 

याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही’…

“प्राजक्त” किंवा “पारिजातक” 

किती नाजुक फुलं..!

कळी पूर्ण उमलली की, इतर फुलझाडांप्रमाणे फूल खुडायचीही गरज नसते. डबडबलेल्या डोळ्यांतून अश्रु ओघळावा, तसं देठातुन फूल जमिनीवर ओघळतं.

“सुख वाटावे जनात,

दुःख ठेवावे मनात”

— हे या प्राजक्ताच्या फुलांनी शिकवलं.

एवढसं आयुष्य त्या फुलांचं..!

झाडापासुन दूर होतांनाही गवगवा करीत नाहीत.

छोट्याशा नाजुक आयुष्यात आपल्याला भरभरुन आनंद देतात.

आणि केवळ आपल्यालाच नाही,  तर आपल्या कुंपणात लावलेल्या झाडाची फुलं शेजारच्यांच्या अंगणातही पडतातच की. 

खरंच…! माणसाचं आयुष्यही असंच… एवढसं… क्षणभंगुर प्राजक्तासारखं…!

कधी ओघळून जाईल माहीत नाही.

आज आहे त्यातलं भरभरुन द्यावं हेच खरं…!!                 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares