मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शरिरी वसे रामायण – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ शरीरी वसे रामायण – लेखक : कवी ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

जाणतो ना काही आपण

शरीरी आपुल्या वसे रामायण || धृ ||

*

आत्मा म्हणजे रामच केवळ,

मन म्हणजे हो सीता निर्मळ !

जागरुकता हा तर लक्ष्मण,

शरीरी आपुल्या वसे रामायण ||१||

*

श्वास, प्राण हा मारुतराया,

फिरतो जगवित आपुली काया |

या आत्म्याचे करीतो रक्षण

शरीरी आपुल्या वसे रामायण ||२||

*

नील जाम्बुवंत रक्त नसा या,

फिरती शोधत जनक तनया

गर्वच म्हणजे असतो रावण

शरीरी आपुल्या वसे रामायण ||३||

*

रक्तपेशी त्या सुग्रीव, वानर,

भाव भावना त्यातील वावर

मोहांधता करी आरोग्य भक्षण

शरीरी आपुल्या वसे रामायण ||४||

*

नखे केस त्वचा शरीरावरती,

शरीर नगरीचे रक्षण करती

बंधु खरे हे करती राखण

शरीरी आपुल्या वसे रामायण ||५||

*

क्रोध म्हणजे कुंभकर्ण तो,

शांत असता घोरत पडतो

डिवचताच त्या करी रणक्रंदन

शरीरी आपुल्या वसे रामायण ||६||

*

गर्वे हरले सौख्य मनाचे

कासावीस हो जीवन आमुचे

संकटी येई शरीर एकवटून

शरीरी आपुल्या वसे रामायण ||७||

*

मनन करता भगवंताचे,

रक्षण होईल आरोग्याचे

रामजपाचे अखंड चिंतन

शरीरी आपुल्या वसे रामायण ||८||

कवी :अज्ञात

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ उसाच्या मुलांची लग्नं – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ उसाच्या मुलांची लग्नं – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

उसाला झाली दोन दोन पोरं,

मोठा मुलगा ‘गूळ’  अन्

धाकटी मुलगी ‘साखर’

 

साखर दिसायला गोरीगोमटी अन् सुंदर,

गूळ मात्र ओबडधोबड अन् काळा कलुंदर

 

साखर तशी स्वभावाला गोड,

तिच्यात उणेपणा शोधणं अवघड

 

गुळ मात्र स्वभावाला चिकट,

समोर दिसला की इतरांना वाटे संकट

 

साखर तशी मनमिळाऊ, जेथे जाई तेथे मिसळून जाई,

गूळ पण गेला ईतरात मिसळायला,पण त्याला ते जमलेच नाही

 

साखरेला गर्दीत शोधणे असे फार अवघड,

गूळ मात्र गर्दीत लगेच दिसे, कारण तो होता ओबडधोबड

 

साखरेचे रव्यावर प्रेम जडले,

बापाने लगेच दोघांचे लग्नच लावून टाकले

 

तिला झाला एक मुलगा

दिसायला होता तो गोरागोरा,

यथावकाश बारसे झाले, नाव ठेवले ‘शिरा’

 

उसाला आता काळजी वाटू लागली गुळाची,

त्याच्यासाठी मुलगी कशी अन् कुठे शोधायची?

 

उसाला होते माहीत, आपल्या मुलाला ना रूप ना रंग,

सतत काळजी वाटायची, कसा जाईल काशीला हा संग

 

बर्‍याच मुली पाहिल्या, कोणी त्याला पसंत करीना,

काळजी वाटे उसाला

रात्री झोप येईना

 

उसाला मित्र एक होता, नाव त्याचे तूप

त्याने प्रयत्न केले खूप,

अन् उसाला आला हुरूप

 

त्याने मुलगी सुचविली गव्हाची,

जी दिसायला होती बेताची

 

धान्यकुळीत उच्च गव्हाचे घराणे,

होते उसाच्या तोलामोलाचे,

ऊस म्हणे मागणी घालणे मुलीला, नाही ठरणार फोलाचे

 

अंगाने ती होती लठ्ठ नि जाडजूड,

रूपाला साजेसे, नांंव होते तिचे ‘भरड’

 

गव्हाला मुलीच्या रूपाची होती कल्पना,

तो कशाला करतो नसत्या वल्गना ?

 

होकार दिला कारण, गुण दोघांचे जुळले,

लग्न जमले अन् सारे तयारीला लागले

 

किचन ओटा झाला,

लग्नासाठी बुक,

स्वयंपाकघर पण सजविले खूप

 

‘भरड’ला तूप कढईत घेऊन गेले,

तेथेच तिचे खरपूस मेकअप पण केले

 

भरपूर लाजली ‘भरड’, अन् झाली गुलाबी,

गरम पाणी कढईत शिरले, अन् भरड झाली ‘शराबी’

 

लग्नाची तयारी पहायला आलेले दूधसुद्धा कढईत शिरले,

अन् हळूच त्याने गुळाला कढईत पाचारीले

 

गुळाने केला कढईप्रवेश, अन् उकळ्यारुप मंगलाष्टकांना आला आवेश

 

मनाने दगड असलेल्या भावनाशून्य गुळाला,

‘भरडी’ चे रुप पाहून, वेळ नाही लागला पाघळायला

 

काजू बदाम किसमिसच्या पडल्या अक्षता,

कढईचे झाकण लावण्याची भटजीने घेतली दक्षता

 

काळांतराने मुलगी झाली त्यांना, सुंदर गोड अशी,

थाटामाटात बारसे झाले,

नाव ठेवले ‘लापशी’

 

आवडली ना

   शिरा आणि लापशी?

कवी :अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ क्षणभर – लेखिका : सौ. कांचन दीक्षित ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ क्षणभर – लेखिका : सौ. कांचन दीक्षित ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

स्त्रियांना कधी कामं करताना पहाल, तर दिसेल की , त्या फिरत गरगरत कामं करतात, सतत उठताना बसताना दिसतात. कारण कामं चहूदिशेला असतात.एका सरळ रेषेतलं एकच एक मोठं काम नसतं, तर लहानसहान वेगवेगळी कामं असतात.म्हणूनच काय आणि किती केलं हे कधी मोजता येत नाही. दिवसाच्या शेवटी सगळं जागच्या जागी हेच उत्तर असतं आणि इतरांच्या यशात असणारा, पण न दिसणारा वाटा,  हेच यश असतं. प्रत्येक खोलीत गेलं की कामं बोलवत असतात आणि स्वयंपाकघरातली कामं तर कधी संपतच नाहीत.

टाईम झोन अनुसार किंवा नैसर्गिक स्त्रीप्रकृतीचा विचार करता स्त्रीतत्त्व मुळात शांत आणि रिलॅक्सड प्रवृत्तीचं आहे. स्त्रीची कामं करण्याची पध्दत आक्रमकपणे फडशा पाडण्याची नसून आनंद घेत निर्मिती करण्याची आहे, पण आजच्या जीवनशैलीमुळे ती सतत अस्वस्थ धावताना दिसते. आतला न्यूनगंड भरुन काढण्यासाठी घरातल्यांना काही देत राहते. स्वतःलाच शिक्षा केल्यासारखी कामात बुडून राहते, स्वतःवरचं कमी झालेलं प्रेम तिला आणखी दु:ख देतं आणि त्या वेदनांपासून, त्या भावनांपासून पळण्यासाठी ती आणखी कामं करत बसते.

शांत बसलं की माणसाच्या मनातल्या भावनांची वादळं वर येतात. विश्रांतीची गरज आहे, स्वतःला वेळ द्यायचाय, स्वतःकडे लक्ष द्यायचंय अशी ओरड आतून येते, खरंतर त्याकडे लक्ष देऊन त्या वेदना हील करणं सोडून ती कामात बर्न आऊट होत रहाते, थकते दमते आणि तक्रार करते. या तक्रारींमुळे इतर आणखी लांब जातात. तिला टाळतात. मग ती आणखी एकटी पडते.

टाईम मॅनेजमेंट हा विषय स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळा आहे आणि तो वेगवेगळया पध्दतीनेच रिझल्ट देणारा आहे. स्त्रीची कार्यक्षमता आणि एकूण दिनक्रम याचा संबंध विश्रांतीशी आहे.  स्त्रियांच्या विश्रांतीला आळस समजणं म्हणजे अक्षरशः अज्ञान आहे. निसर्ग संतुलन साधत असतो, यशासाठी जितकी धावपळ,गडबड,पळापळ गरजेची असते,तितकीच शांतता आणि विश्रांतीसुध्दा.

एक उपाय सुचवत आहे. अनेक घरात असेलही. पण ज्यांना माहीत नाही त्यांनी हा प्रयोग करुन पहा. आपल्या घरातल्या सगळया स्त्रिया जिथे जास्त वेळ उभ्याने काम करतात, जिथे जास्त वेळ घालवतात, तिथे एक लहानसा स्टूल बसण्यासाठी ठेवा. पटकन बसता येईल, टेकता येईल असा एक स्टूल ओट्यापाशी हवाच. चहा, दूध गरम होईपर्यंत, भाजी चिरताना, निवडताना ओट्यापाशी पटकन विसावता येईल.

स्टूल फार मोठा जागा व्यापणारा, अडचणीचा नको, लहानसा, हलका !

कोणी म्हणेल आमच्या किचनमधे डायनिंग टेबल आहे, पण कामात ती खुर्ची पटकन घेतली जात नाही. बायका उभ्यानेच खातात, चहा पितात आणि तासनतास बसत नाहीत. मग पाठदुखी कंबरदुखी मागं लागते.

हे स्टूल प्रतीक म्हणून काम करेल, विश्रांतीची आठवण करुन देणारं प्रतीक!

‘बस जरा. कामं पळून जात नाहीत. दोन मिनिटं शांत बस. पाणी पी,’

हे सगळं बोलणारं कुणी असायची गरज नाही. हे स्टूल बोलेल.

या क्षणभर विश्रांतीनं थकवा 50% कमी होईल. सगळं संपल्यावर एकदम कोसळायला होणार नाही आणि मनालाही शांतता मिळेल. किचनमधला असा हा कृष्णसखा क्षणभर विश्रांती देऊन कशी मदत करतो, हे खरंतर सवयीनं अनुभवण्याची गोष्ट आहे, बघा प्रयोग करुन!

लेखिका : श्रीमती कांचन दीक्षित

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘कोणी नसे कुणाचे’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री शिवकुमार कर्णिक ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘कोणी नसे कुणाचे’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री शिवकुमार कर्णिक ☆

प्रत्यक्ष वेळ येता

कोणी नसे कुणाचे ।।धृ ||

*

कन्या स्नुषा नृपांची, प्रत्यक्ष रामभार्या ।

पिचली क्षणाक्षणाला, कारुण्यरुपी सीता ।

कामी तिच्या न आले, सामर्थ्य राघवांचे….

प्रत्यक्ष वेळ येता,

 कोणी नसे कुणाचे  ll १ ll

*

त्यागून सूर्यपुत्रा,

 कुंती पुन्हा कुमारी ।

कर्णास अनुज माता, सारेच जन्म वैरी ।

कौतुक का करावे,

 त्या रक्तबंधनाचे ….

प्रत्यक्ष वेळ येता,

कोणी नसे कुणाचे  ll २ ll

*

केली द्यूतात उभी,

साक्षात कृष्णभगिनी ।

सम्राट पांडवांची, रानावनात राणी ।

पति पाच देवबंधू ,

तरी भोग हे तियेचे…….

प्रत्यक्ष वेळ येता,

कोणी नसे कुणाचे  ll३ll

*

ठेवू नको अपेक्षा,

असल्या जगाकडूनी ।

निरपेक्ष आचरी तू,

कर्तव्य प्रेम दोन्ही,

मग चालूदे सुखाने, अव्हेरणे जगाचे 

प्रत्यक्ष वेळ येता,

कोणी नसे कोणाचे..||४||

कवी:अज्ञात

प्रस्तुती: श्री. शिवकुमार कर्णिक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘अनासायेन मरणं’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘अनासायेन मरणं’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनम्।

देहांते तव सान्निध्यम् , देहि मे परमेश्वर:।।

माझे सासरे रोज पुजा झाल्यावर हा श्लोक म्हणतात. कधीकधी त्यांचा गळासुद्धा भरून येतो हे म्हणताना.

त्यांची पूजेची वेळ आणि माझी स्वयंपाकाची वेळ बहुधा एकच असते. मला पण छान वाटतं. असं वाटतं की माझ्या स्वयंपाकावर अनायासे संस्कार होत आहेत.

पूर्ण पूजा झाल्यावर जेव्हा ते हात जोडून हा आशीर्वाद देवाकडे मागतात, तेव्हा तो क्षण मी माझ्या मनात फार जपून ठेवते.

त्यांची पाठमोरी आकृती, देवाजवळ तेवणारी शांत समई आणि निरांजन, उदबत्तीचा सुवास आणि नुकतेच चंदनाच्या उटीने आणि झेंडूच्या किंवा तत्सम फुलांनी सजलेले माझे छोटेसे देवघर.

शुद्ध अंतःकरणाने देवाला काय मागायचे तर,

अनायासेन मरणं :

मृत्यू तर आहेच पण तो कसा हवा तर अनायासेन – सहज.

विनादैन्येन जीवनं :

जीवन असं असावं जिथे आपण कुणावर अवलंबून नको, उलट कोणाचातरी आसरा बनता यावे.

देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर:

मृत्यूनंतर कोणाचं सानिध्य लाभावे तर ‘हे परमेश्वरा तुझेच’.

पण हे सगळं व्हायला आपलं जीवनक्रमण तसेच झालेले हवे, तरच हे शेवटचे दिवस समाधानाचे जातील.

इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले

गोविन्द नाम लेकर, फिर प्राण तन से निकले

 

हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा

न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा

काय मागणे आहे ना. रोज जर तुमच्या घरात ह्या सगळ्याचा गजर झाला, तर कुठल्या दुसऱ्या संस्कारवर्गाची गरज भासेल का?

परवा एका मैत्रिणीशी गप्पा मारत होते. दोन नवतरुणांच्या आयांची जी ओरड तोच विषय आमचापण होता.

हल्ली संस्कार कमी पडतात. बोलता बोलता ती म्हणाली, “आता काय गं आपली मुलं मोठी झाली. संस्कार वगैरे ह्या सगळ्याच्या पलीकडे, आता ती घडली. आता परिवर्तन होणार नाही.”

मला तेव्हा सांगावंस वाटलं तिला, ‘संस्कार काय १०वी-१२वी किंवा पदवीधर असं नाही गं.

आता १३ वर्षाचा कोर्स पूर्ण झाला, आता काही होणार नाही, असं नसतं.

संस्कार तुमच्या मनाची जडण-घडण आहे. ती एकदा करून चालत नाही, सतत मनाची मशागत करत राहावी लागते. ‘

माझीपण मुलगी आता मोठीच झाली आहे. पण जोपर्यंत ती घरात रोज हे बघेल, ऐकेल, तिच्या मनावर त्याचे संस्कार होतच राहतील.

आज कदाचित त्याचं महत्त्व तिला कळणार नाही. पण जेव्हा ती तिच्या आयुष्याची सुरुवात करेल, आपलं विश्व निर्माण करेल, त्यावेळी ही ‘संस्कार शिदोरी’ तिला उपयोगी पडेल.

देवासमोर हात जोडताना ‘नवस’ बोलण्यापेक्षा ‘दिलेल्या जीवनाबद्दल आभार’ मानणे, ह्यावर विश्वास ठेवणारी आपली संस्कृती. 

आपल्या जीवनाची  ‘जबाबदारी’ जोपर्यंत आपण घेत नाही, तोपर्यंत ‘ती अगाध शक्ती’सुद्धा आपल्याला मदत करणार नाही आणि ज्या क्षणी आपण आपल्या जीवनाची जबाबदारी घेतो त्याक्षणी आपले ‘मागणेच बदलते’.

अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनम्।

देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर:।।

लेखक  :अज्ञात

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “चहा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “चहा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

चहाला सोडा लागत नाही..

Tonic water लागत नाही..

प्रिंगल्स , खारवलेले काजू  , शेजवान , चकल्या लागत नाहीत…

साध्या चिनीमातीच्या कपात काम होतं !

crystal glass चे फालतु खर्च नाहीत..

गरमच प्यावा लागतो त्यामुळे सर्दी, घसादुखी होत नाही…

आबालवृद्धांसमोर बसून आबालवृद्ध पिऊ शकतात..

देव्हाऱ्यासमोर / देवळासमोर / देवळामागे / मार्गशीर्षात / गुरुवारी / शनिवारी / तीर्थक्षेत्री / चतुर्थी कधीही , कुठेही पिऊ शकतो..

कितीही महागाचा घेतलात तरी ६० ml चा जास्तीत जास्त खर्च ३०-४० रुपयेसुद्धा होणार नाही. 

” आत्ताच पिऊन आलो, ” असं न घाबरता तोंड वर करून सांगता येतं.

perfume मारावा लागत नाही.

centre fresh खावा लागत नाही.

१२० ml पिऊनसुद्धा कप खाली ठेवल्या ठेवल्या स्टिअरिंग हातात घेऊन बेफाम गाडी चालवू शकता.

Traffic police अडवत नाही.

चार मित्र मिळून प्यायला बसलात, तर मधेच उठून कुणी कुणाला मिठ्या मारत नाही, किंवा एकाएकी इंग्लिशही बोलत नाही.

चहामुळे कुणाला अद्याप जुन्या खटल्यांची आठवण येऊन, धाय मोकलून रडत, गजल आणि breakup songs लावल्याचं पहाण्यात नाही…

चहाचा कच्चा माल टेनेसी किंवा स्कॉटलंड किंवा रशियावरून यायची गरज नसते…

आसाम, दार्जिलिंग, केरळ वगैरे देशी ठिकाणी तयार होतो.

देशसेवासुद्धा होते.

काळ्या पिशव्यांची गरज नसते.

लाकूड तोडून त्याचे बॅरल्स लागत नाही..

गॅसशेगडी, म्हशीचं  ताजं दूध, चहाची पत्ती नि साखर एवढंच पुरतं.

असा हा निरागस, पण तितकाच चैतन्यदायी चहा, तुम्हाला आजन्म मिळत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.

सोबत उत्तम गरम गरम चहा करून, हातात आणून देणारा/देणारी मिळाली तर चहात वेलची !

कवी :अज्ञात

संग्राहक  : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भोजन – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

? वाचताना वेचलेले ?

भोजन – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

लहानपणी खूप पदार्थ नसायचे.

जेवणाच्या बाबतीत लाडही नसायचे.

आईचा स्वयंपाक होत आला की पाटपाणी घ्यायचे.

त्यात सुध्दा क्रम आणि जागा  ठरलेली  असायची.

पाट, पाण्याचे लोटी-भांडे ,ताट , वाटी (चमचा गरज असेल तर) , हातांनीच जेवायचे.

पान पद्धतशीर वाढायचे.  घरात जेवायला  केलेले सगळे पदार्थ अगदी थोडे थोडे वाढले जायचे. नैवेद्य  दाखवल्यावर जेवायला सुरवात करायची.  आधी श्लोक म्हणायचे. एका सुरात, एका तालात.

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे

सहज हवन होते नाम घेता फुकाचे

जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म,

उदर भरण नोव्हे जाणिजे यज्ञ कर्म.

पानात पहिले वाढलेले सगळ्यांनी  खायचेच.मग लागेल तसे परत घ्यायचे.

पानात काहीही टाकायचे नाही.आवड नावड नाही . पहिले वाढलेले सगळे खायचे.नको असेल तर परत घ्यायचे नाही. हा दंडक होता.ही शिस्त होती.नावडते पदार्थ पाण्याच्या घोटाबरोबर गिळायचे, पण पानात काही टाकायचे नाही. जेवणाला नावे ठेवायची नाहीत.पदार्थ कसाही झाला तरी खायचा.माऊली कष्टाने रांधून , प्रेमाने सगळ्यांना जेवायला वाढतेय.साक्षात अन्नपूर्णा आहे ती.कशालाही नावं ठेवायची नाहीत.पूर्वी स्टोव्हवर,चुलीवर, कोळश्याच्या शेगडीवर स्वयंपाक करायचा. कधीतरी पदार्थाला धुराचा किंवा रॉकेलचा, करपलेला वास यायचा.  पण न बोलता जेवायचे. खूप कडक शिस्त होती.नसते लाड चालायचेच नाहीत.अन्नाला नावे ठेवायची नाहीत.

शाळेतही श्लोक म्हणूनच डबा खायचा.एकमेकांना वाटावाटी करुन खायचा.समजा कोणी आणला नसेल तर त्याचंही पोट भरायचे.हे संस्कार न कळत घडत होते.

जनी भोजनी नाम वाचे वदावे ,

अती आदरे गद्य घोषे म्हणावे

हरी चिंतने अन्न सेवेत जावे ,

तरी श्रीहरी पाहिजे तो स्वभावे ..

 

धुवा हात पाय चला भोजनाला

बसा नीट येथे तुम्ही मांडी घाला

नका मागू काही अधाशीपणाने

नका टाकू काही करा स्वच्छ पाने.

आई नेहमी म्हणायची, ‘खाऊन माजावे  पण टाकून माजू नये.अन्नाचा शाप बाधतो.’ अर्थ फारसा कळायचा नाही.पण पानात वाट्टेल ते झाले तरी टाकायचे नाही, हा संस्कार सहज घडला.अन्नाचा कणही वाया जाता कामा नये,असा सक्त नियम होता.

मुखी घास घेता करावा विचार

कशासाठी हे अन्न मी सेवणार

घडो माझिया हातूनी देशसेवा

त्यासाठी मला शक्ती दे देवराया..

 

वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे

सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे

कृषीवल कृषीकर्मी राबती दिनरात

श्रमिक श्रम करुनी वस्तु या निर्मितात

करुन स्मरण तयांचे अन्न सेवा खुशाल

उदरभरण आहे चित्त होण्या विशाल.

अशा श्लोकांतून अन्नसेवनाचा संस्कार सहज घडतो.

आपल्यावर झालेला संस्कार पुढच्या पिढीवर रुजविण्याचा  प्रामाणिक प्रयत्न करायचा.आज सगळं बदललं आहे तरी आपण सांगत राहायचे.ह्याचा परिणाम होतो.आधी विरोध होईल.वेळ नसतो आम्हांला, हे ऐकून घ्यावे लागेल.ही शाश्वत मूल्ये ,जीवनमूल्ये आपल्याला मिळाली, ती सांगत रहायची ,रुजवत राहायची.

नको तिथे लाड नाहीत.वेळच्या वेळी सांगायचे .त्यामुळे चांगली शिस्त, संस्कार मनात रुजतात.सगळ्या भाज्या, पदार्थ आवडीने खाल्ले जातात .पानात पडेल ते खायचे. टाकायचे नाही. हवे तेवढेच घ्यायचे .दोन घास कमी पोटात गेल्याने काही बिघडत नाही.हे विचार मिळतात.

गोष्ट छोटी असते.संस्कार महत्त्वाचा.

तेव्हा लग्नाच्या पंगतीतही ‘वदनी कवळ घेता’ हा श्लोक खणखणीत आवाजात म्हटला जात असे.

‘पार्वतीपते हर हर महादेव’च्या गजराने भोजनास प्रारंभ होत असे. लहान मुलांनाही पंगतीत बसून हवं नको विचारुन वाढले जात असे.पान स्वच्छ केल्याशिवाय उठता येत नसे.

लहान असताना बोडणाला कुमारिका म्हणून जेवायला एकटेच जावे लागे. बोलावणे आल्यावर ‘नाही’ म्हणत नसत.

लहान मुलांनाही बटू म्हणून जेवायला जावेच लागे. कळतनकळत पानात न टाकता सगळे व्यवस्थित जेवण व्हायचे.

बदल करायचा कालानुरूप पण शाश्वत जीवनमूल्यं सोडायची नाहीत. तोच आपल्या समृद्ध जीवनाचा पाया आहे. त्यातला भाव , मर्म समजून घ्यायचे अन्नदान हा संस्कार आहे.

अन्न वाया घालवणे हा माज आहे.

अन्नाचा त्या पूर्णब्रह्माचा अपमान करायचा नाही, हा संस्कार आहे.

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “छप्पन…” – लेखक : श्री प्रकाश एदलाबादकर ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “छप्पन…” – लेखक : श्री प्रकाश एदलाबादकर ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

छप्पन (५६) या संख्येला मराठी भाषेत वेगळेच महत्त्व आहे. समजा, माझे आणि एखाद्याचे भांडण झाले तर,तो किंवा मी असे म्हणतो की, ‘अबे जा बे …तुझ्यासारखे छप्पन पाह्यले.’

माझ्याही मनात हा प्रश्न आला होता की,’ छप्पनच का ? पंचावन्न किंवा सत्तावन्न का नाही ?’

शंकानिरसनासाठी मी,मराठी भाषेच्या एका प्रसिद्ध ,ज्येष्ठ साहित्यिकाला भेटलो. ते मला म्हणाले की , “संत नामदेवांनी ज्ञानेश्वरी संबंधाने लिहिलेल्या ओव्या तू वाचल्या आहेस का ?”

“हो . एकतरी ओवी अनुभवावी.  तेच ना ?'”मी उत्तरलो .

“बरोबर .त्यात एक ओळ आहे . ‘केलासे छप्पन भाषांचा  गौरव ‘ .अर्थ असा की ज्ञानेश्वरीत मराठी भाषेतील छप्पन भाषांमधील शब्द आलेले आहेत . त्यांच्या काळात मराठीच्या छपन्न बोली होत्या . वऱ्हाडी ,झाडी , मालवणी ,कोंकणी , अहिराणी ,माणदेशी, अशा अनेक परंतु छप्पन बोली होत्या . आता एक लक्षात घे .छपन्न प्रकारच्या  बोली बोलणारे छपन्न प्रकारचे समाज .प्रत्येकाची रीतभात वेगळी,वृत्ती वेगळी, व्यवहार वेगळा ! अशी छपन्न प्रकारच्या मनोवृत्तीची माणसे होती .म्हणून ‘तुझ्यासारखे छपन्न पाहिले’ असे म्हणण्याची पद्धत आली .”

ते पुढे म्हणाले , ” छपन्न प्रकारचे समाज म्हणजे स्वयंपाक करण्याच्या छपन्न रीती. म्हणून ‘छपन्न भोग’ . छपन्न प्रकारचे नैवेद्य . समाजात  एखादी बाई खूप भांडकुदळ , वचवचा बोलणारी , उठवळ स्वभावाची असेल तर ,तिला ‘छप्पन टिकल्यांची आवा’ म्हणतात .म्हणजे सर्व छपन्न प्रकारच्या  समाजात जाऊन आपल्या नावाचा दगड पाडून आलेली .”

नाना पाटेकरच्या चित्रपटाच्या  “अब तक छपन्न  ‘ या शीर्षकामागीलही कारण हेच असेल काय?

लेखक: श्री. प्रकाश एदलाबादकर

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गृहलक्ष्मी… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ गृहलक्ष्मी… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

तुम्ही कधी एकटे असताना

शांतपणे बसून विचार केला आहे का?

…… तिनं तुमच्यासाठी काय केले आहे याचा ?

 

ती तासंतास स्वयंपाक घरात

काही बाही बनवत असते…

आणि तुम्ही काही सेकंदात ते फस्त करता …

 

कधीतरी ती उन्हात काहीतरी वाळवते…

तर कधी पाण्यात काही तरी भिजवते …

कधी चटपटीत मसालेदार..

कधी कधी गुळापेक्षाही गोड…

तर कधी तिखटआंबटगोड चवींचं…

 

मेथीच्या पराठ्यात, गाजराच्या हलव्यात,

भोपळ्याच्या भरीतात, जवसाच्या चटणीत,

बारीक चिरलेल्या कोथिंबीरीत तर कधी

वेलदोड्याच्या टरफलात …

 

आपण फक्त सजलेली डीश पाहतो…

आणि ताव मारतो…. पण आपल्याला दिसत नाही…

 

 

स्वयंपाकघरातली उष्णता,

 

हातावर गरम तेलाचा शिडकावा,

 

अंगावर आलेली गरम वाफ,

 

कापलेल्या खुणा,

 

पायांना येणारी सूज,

 

पांढरे होणारे केस..

 

आणि थकत चाललेली तिची गात्रं ….

 

ती जाणवू देत नाही….

 

त्या छोट्याश्या स्वयंपाकघरात कधीतरी नीट बघा… तुम्हाला तीच दिसेल…..

ओट्याचा आधार घेऊन उभी असेल!

 

वर्षानुवर्षे काय बदललेलं आहे…

काही दात सरकले असतील…

काही केस गळून पडले असतील…

तुमच्या घराचं घरामध्ये रूपांतर करताना

काही सुरकुत्याही आल्या असतील…..

 

तिचा नाकावर येणारा चश्मा ,

हातात वळणारा लाडू,

गोल गरगरीत पोळी लाटताना

व्यस्त असणारी तिची नजर …

आजही ती तेच करतेय…

गेली अनेक वर्षे ती तेच ते करतेय,

आणि तुम्हाला बघताच मग विचारेल…..

“काय हवंय ?”…

 

हे सर्व कुठून आणते माहीत नाही…

किती आणते कुणास ठाऊक…

कशात किती काय काय घालते….

पुरवून उरवते मात्र!

कधीतरी विचार करा …

आजवर तिनं जे काही केलं असेल…

ते तुम्ही नक्कीच करू शकणार नाही…

 

तिच्या मनातल्या काही अव्यक्त भावना आणि दडपलेल्या इच्छा कधी पाहिल्याचं आठवतंय,

ज्या आपल्याला दिसत नाहीत..

 

कारण न दिसणाऱ्या गोष्टी पाहणे

आपल्या साठी महत्त्वाचे नसते कधी…

रादर…. तसा चश्मा आपल्याकडे नसतो,

 

कधी तिच्या अनुपस्थितीत…

जेव्हा  दोन बिस्किटं अन् तिनंच केलेला चहा

हातात घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर येऊन

कोचावर स्वतःला झोकून देतो ,

 

तेव्हा मग तिचेच शब्द,

विचार करायला भाग पाडतात…

‘काय हवंय?’

कारण एवढ्या वर्षांत तिनं

फक्त अन्न शिजवलेलं नसतं …

तर  घरपण तयार केलेलं असतं …

स्वतःला झिजवून…

 

बनवायला तास लागतात हो …..

 

संपूर्ण घर उभं केलंय तिनं…

रात्रंदिवस मेहनत करून.

 

तुम्ही एकदा यादी बनवता का?

तिनं काय केले आहे याची ?

 

यादी बनवता येणार नाही

प्रयत्न केला तरी ..

पण चश्मा नक्कीच बदलू शकतो आपण!

कवी :अज्ञात

संग्राहक  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रिकामटेकडी… लेखिका :श्रीमती स्नेहल अखिला अन्वित ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ रिकामटेकडीलेखिका :श्रीमती स्नेहल अखिला अन्वित ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर 

जवळजवळ दोन वर्षांनी लांबच्या शहरात राहणारे काका काकू आले म्हणून प्राजक्ता मनातून खूपच आनंदी होती. आणि तिची मुले, त्यांचे आवडते मामा मामी आले म्हणून! काका काकू अगदी सहकुटुंब आले होते प्राजक्ताच्या घरी.

तिला तर काय करू अन् काय नको, असं झालं होतं. लहानपणी काही वर्ष एकत्र कुटुंबातच वाढली असल्याने, काकू म्हणजे तिच्यासाठी दुसरी आईच होती जणू. त्यांच्या मुलाबरोबरच वाढली होती प्राजक्ता. त्यामुळे अगदी सख्ख्या भावंडासारखंच प्रेम होतं. प्राजक्ता दहावीत गेल्यावर मात्र तिच्या वडिलांची बदली झाली आणि नंतर हळूहळू कुटुंबातली सगळीच माणसं वेगवेगळ्या दिशेनं पांगली.

पण ओढ मात्र तशीच राहिली.

त्याच ओढीनं एकमेकांकडे जाणं येणं होत होतं.

म्हणूनच दिवाळीनंतर काका काकू आपल्या मुलाला आणि सुनेला घेऊन चार दिवस प्राजक्ताकडे राहायला आले होते.

आल्यादिवशी संध्याकाळी प्राजक्ताने मस्त भरल्या वांग्याची भाजी केली आणि सर्वांसाठी जवळच असणाऱ्या पोळीभाजी केंद्रातून मस्त खरपूस गरमागरम भाकरी आणल्या. सर्वांची छान जेवणं झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी पोळ्यांना बाई आली. चहा पाणी झाल्यावर, दोन्ही घरचा दिवाळीचा फराळ खाल्ल्यावर प्राजक्ता सर्वांशी गप्पा मारत बसली असता तिचा भाऊ म्हणाला, नाष्ट्याला कर काहीतरी पोहे, उप्पीट.

प्राजक्ताला कळेना,आत्ता फराळ झाला, परत का नाष्टा? पण कधीतरी आलेल्या पाहुण्यांना नको कशाला बोला, म्हणून तिने गरमागरम उप्पीट केलं.

ते झाल्यावर गप्पा टप्पा करतच प्राजक्ताने भाजी, कोशिंबीर केली. गुलाबजाम त्यांच्या एरियातल्या प्रसिद्ध हलवाईकडून आणले होते. खास आपल्या माणसांसाठी म्हणून!

पोळ्या बाईने केलेल्या होत्या म्हणून पटकन जेवण तयार झालं सुद्धा. वहिनीला तर तिने स्वैपाकघरात फिरकूसुद्धा दिलं नाही.

मुलांना मामा मामी भेटले होते, म्हणून प्राजक्ताला जे हवं ते मनसोक्त करू दिलं त्यांनी.

दुपारची जेवण आटोपली. पाहुणे आडवे झाले. प्राजक्ताच्या घरी दुपारी झोपायची सवयच नसल्याने ती मुलांबरोबर खेळत राहिली.

संध्याकाळी सर्व मस्त बाहेर फिरून आले. सकाळच्या पोळ्या उरल्या होत्या, प्राजक्ताने विचारलं पोळ्या तर आहेत, भाजी कोणती करू?

तर तिचा भाऊ पटकन म्हणाला, पोळ्या नको भाकरी कर.

प्राजक्ता म्हणाली,भाकरी खायचीय का तुला?

ठीक आहे, मी आणते कालच्यासारखी.

छे, छे बाहेरच्या नको. तू कर……

अरे पण तुला काल तर आवडल्या होत्या त्या भाकरी?

हो. पण तू कर की. मी कालपासून बघतोय. तू काहीच करत नाहीस घरात. तू करून दे आम्हाला भाकरी…….

प्राजक्ताला खरंतर रागच आला होता, त्याच्या बोलण्याचा. तरी तो गिळून ती म्हणाली, मी नाही करत भाकरी. मला येतही नाहीत. एवढे फिरून आलो आपण, आता कुठे भाकरी करत बसू? आणि जवळच तर मस्त गरमागरम मिळतात. मी का कष्ट घेत बसू उगाच? लागेल तेव्हा आणते मी.

तेवढ्यात काकू म्हणाली, “पोळ्या तुझी बाई करते. धुण्याभांड्यालाही बाई आहे. घरातली कामं सगळ्यांना वाटून टाकलीयेस. अगं, नवराही ऑफिसवरून आल्यावर काम करतो तुझा, अगदी मुलीलाही काम लावलंयस. तू काही करताना दिसतच नाहीस. त्यातून तू घरातच आहेस.आमची सुनबाई बरी की. ती तर ऑफिसला जाऊनही स्वैंपाकासकट किती कामं करते!”

“अगं काकू, घरातली कामं घरातल्या सर्वांनी वाटूनच करायची असतात. ज्याला त्याला त्याचं आवडतं काम दिलंय. ते त्यांच्या सवडीने करतात. कुणावर काही जबरदस्ती नाही केली मी. नवरा ऑफिसवरून आल्यावर काम करतो, तर ते त्याला आवडतं म्हणून. मुलीने तर हौस म्हणून मागून घेतलंय. घरी आहे म्हणून मीच सर्व केलं पाहिजे असं कुठे लिहिलंय?”

“पण बाईच्या जातीला असं नुसतं बसून राहणं शोभतं तरी का?” काकूला तर पटलंच नाही तिचं बोलणं.

“अगं काकू , तुला कुणी सागितलं, मी नुसतं बसते. माझे मला उद्योग आहेत चिक्कार!

आता तुम्ही आलात म्हणून मी तुमच्याबरोबर माझी रोजची कामं सोडून गप्पा मारत बसलीये एवढंच. उलट तुम्हाला तर छान वाटलं पाहिजे. पाहुणे आलेत म्हणून स्वतःला स्वैपाकघरात गाडून न घेता मी तुमच्याबरोबर एन्जॉय करतीये म्हणून!

इकडे येऊन पण तुम्ही एकमेकांची तोंडं बघत बसलात तर फायदा काय? मला भेटायला आलात ना प्रेमाने. मग मीही तुमच्याबरोबर राहून, तुमच्याबरोबर सतत गप्पा मारून तुमचे आणि माझे चार दिवस सुखाचे करतीये तर त्यात काय चुकलं माझं?

आता तुम्ही आल्यावर मी माझी कामच करत बसले तर काय म्हणाल, बघा आम्हाला बोलावलं आणि तिच्याकडे काही वेळच नव्हता आमच्यासाठी!”

तेवढयात तिचा भाऊ म्हणाला, “पण कामं तर काही दिसतच नाही तुला. रिकामटेकडीच तर बघतोय दोन दिवस.”

“दादा, मी रिकामी दिसतेय कारण मुलं तुमच्यामागे आहेत. पाहुणे आल्याचा त्यांना आनंद झालाय, म्हणून त्यांनी मला सोडलंय. तुम्ही सकाळी सातला उठताय. मी ही अगदी तेव्हाच उठते रोज. चहा पाणी करते. पटकन भाजी टाकते. पोळ्या बाई करते. तेवढा वेळ मिळतो त्यात मी व्यायाम, योगा करते माझ्यासाठी. मग मी माझी आवडती पुस्तकं वाचते. कधी आवडती गाणी ऐकते. माझा वेळ मी हवा तसा घालवते. अगदी मोजके दीड-दोन तास मिळतात रे मला माझ्यासाठी. नऊला मुलं उठली की चक्र सुरू होतं माझं. मग त्यांचं सर्व झालं की चार वाजल्यापासून मी ऑनलाईन क्लासेस घेते आठवी ते दहावीच्या मुलांचे संस्कृतचे. ते अगदी आठपर्यंत चालतात. ते संपल्यावर मुलं इतका वेळ मी बिझी होते, म्हणून खेळायला सांगतात त्यांच्याशी. त्यांना मी त्यांच्याबरोबर रहावी, वाटतं . मग त्यांना बाजूला सारून स्वैपाकपाणी करत बसणं, त्यासाठी जिवाची मारामारी करणं, नाही पटत मला. सुटसुटीत मोकळं राहायला आवडतं मला. आणि अगदी घरच्या चवीची भाजी भाकरी गरमागरम मिळते बाजूलाच, तर का उगाच करत बसू मी?

भले घरी असते, घरातून थोडं बहुत काही करते, म्हणून रिकामं मोकळं राहायचा अधिकार नाही का मला? मला आवडतं, आणि माझ्या घरी सर्वाना चालतंही.

“उद्या आमची सुनबाई म्हणाली असं तर आम्हाला नाही चालणार मात्र,” काका मधेच म्हणाले.

“तुम्ही थोडा तिच्या बाजूने विचार केलात तर नक्की चालेल तुम्हालाही. अर्थात तिची तशी इच्छा असेल तरच.

काय रे दादा, तू विचारलं का तिला कधी?”

“मला हे तुला असं बघूनच त्रास होतोय, तर ती ही अशी वागली तर काय होईल! ए, तू हिला शिकवू नको बाई असलं काही.”

“मी कशाला शिकवू, दादा? आपली मतं कुणावर लादता येतात का कधी? जो तो स्वतःच्या अनुभवाने शिकतो. जमलं तर बदलतो नाहीतर मन मारून जगतो वर्षानुवर्ष.

आता तुम्ही आलात म्हणून माझं रुटीन थांबवलंय मी. सगळा वेळ तुमच्यासोबत घालवतेय. क्लासला चक्क सुट्टी दिलीये मी तुम्ही असेपर्यंत!

तर तुम्हाला माझं रिकामपण टोचायला लागलंय.”

“आम्हाला बघायला वेगळं वाटतं असं,” काकू नाराजीने म्हणाली.

“वेगळं कुणाला पटकन पचत नाही, हे खरं. बघणाऱ्या बाईला नाही आणि पुरुषाला तर नाहीच नाही.

वर्षानुवर्षे बाईला कामात गढलेलीच बघायची सवय ना डोळ्यांना. मोकळेपण डोळ्यात सलतं बाईचं. मोकळ्या मनाने मोकळी राहू देणारच नाहीत कोणी तिला. बोलण्यातून नाहीतर नजरेतून घायाळ करणारच तिला.” प्राजक्ताने आपली बाजू मांडायचा केलेला प्रयत्न फारसा कोणाला रुचलाच नाही. ते त्यांना स्वतःच्या सोयीचं वाटलं नसावं बहुतेक, म्हणून प्राजक्तानेही पुढे जास्त बोलणं टाळलं.

पाहुण्यांचे चार दिवस संपले, तसे ते निघाले. जाताना मात्र प्राजक्ताच्या भावाच्या बायकोने आजूबाजूला कोणी नाही बघून तिला हाताला धरून ‘Thank you’ म्हटलं.

 “चार दिवस मी जो मोकळेपणा अनुभवला तुमच्याकडे तो बाकी कुठेच कधी अनुभवला नाही, अगदी माझ्या माहेरी पण. जरा निवांत बसले, की कुणाच्या ना कुणाच्या डोळ्यात खुपायचंच हो! काही ना काही करत राहणारी बाईच आवडते सर्वांना. जरा बसली की नावं ठेवणं सुरू, मग ते घरचे नाहीतर दारचे कोणी का असेना!

सध्या तरी माझी मानसिक तयारी नाही कुणाच्या विरोधात जाण्याची, पण हळूहळू झाली की मला आवडेल तुमच्यासारखं रहायला!”

प्राजक्ताने गोड हसून तिला निरोप दिला. ‘सर्वांनाच जमणाऱ्यातलं नाही ते,’ असं मात्र आवर्जून मनात वाटलंच तिला.

लेखिका :श्रीमती स्नेहल अखिला अन्वित

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares