मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ विनंती… – लेखिका  : सुश्री मंगला खानोलकर ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ विनंती… – लेखिका  : सुश्री मंगला खानोलकर ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी

मागच्या ‘वीक एन्ड’ ला

तुम्हा दोघींचा फोन आला

“आई,’मदर्स डे ‘चं तुला काय हवं?”

प्रश्न विचारलात मला,

“मायक्रोवेव्हचे डबे, सेंटची बाटली

की काॅर्निंगचा सेट,नॉनस्टिकची भांडी?”

*

संभ्रमात पडले मी

तुमचा प्रश्न ऐकून

त्याचवेळी तुमचं बालपण

गेलं डोळ्यांपुढे सरकून

सारं काही आठवताना

माझ्या मनात आलं

तुम्ही लहान असताना,

मी तुम्हाला काय बरं दिलं…?

इवल्या इवल्या माझ्या पिल्लांना

दिली भरभरून माया

उन्हाची झळ लागू नये

म्हणून पदराची केली छाया

तुमचं बोट धरून तुम्हाला

शिकवलं चालायला

कधी घातले चार धपाटे

तुम्हाला वळण लावायला

वादळवा-यापासून जपण्यासाठी

दिला प्रेमाचा निवारा

कठोर जगापासून वाचविण्यासाठी

सदैव जागता पहारा

तुमच्यावर ठेवली करडी नजर

बनून आभाळपक्षीण

तुमचं हितगुज ऐकण्यासाठी

बनले तुमची मैत्रीण

आज तुम्ही मला विचारताय

‘आई तुला काय हवं…?’

खरंच देणार आहात का तुम्ही

मला जे हवंय ते…?

म्हटलं तर अगदी सोपं आहे

पण पैशांनी नाही मिळणार ते

मला नकोत भेटवस्तू ,

नकोत उंची साड्या

या सा-यांनी भरलंय कपाट

बिनमोलाच्या गोष्टी सा-या

आज मला हवंय तुमच्यातलं आईपण

हळव्या झालेल्या मनाला हवंय

दोन घडीॅचं माहेरपण

दिलेली गोष्ट परत मागू नये

हे कळतंय माझंच मला

पण तुमच्या  मायेची गरज आहे

आज तुमच्या आईला

खळाळतं पाणी पुढेच वाहणार

हे पटतंय ग मनाला

फक्त कधीमधी मागे वळून पाहा

एवढीच विनंती तुम्हाला…!!!

कवयित्री : सुश्री मंगला खानोलकर

प्रस्तुती :सुश्री शशी नाडकर्णी- नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “डिफॉल्ट मोड म्हणजे काय ?” – लेखक : डॉ. यश वेलणकर ☆ प्रस्तुती – श्रीमती राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “डिफॉल्ट मोड म्हणजे काय ?” – लेखक : डॉ. यश वेलणकर ☆ प्रस्तुती – श्रीमती राधा पै ☆

तुम्ही तुमच्या बोक्याला, कुत्र्याला किंवा बैलाला मधुमेह, हायपरटेन्शन किंवा थायरॉइडचा त्रास होतो आहे, असे पाहिले आहे का?

तशी शक्यता खूप कमी आहे. माणसात मात्र हे आजार खूप वेगाने वाढत आहेत. त्याचे एक कारण आहे. आपल्या मेंदूतील एक ठरावीक भाग सतत काम करीत असतो. माणूस शांत बसलेला असतानादेखील हा भाग शांत होत नाही. हे सतत मनात येणारे विचार आपल्याला युद्धस्थितीत ठेवीत असतात. त्यामुळेच मानसिक तणाव वाढतो आणि आपल्याला वरील सर्व आजार होतात.

आपण शांत बसलेले असतानादेखील मेंदूतील जो भाग काम करीत असतो, त्याला शास्त्रज्ञांनी ‘डिफॉल्ट मोड नेटवर्क’असे नाव दिले आहे.

कॉम्प्युटर सुरू केला, की याच मोडमध्ये तो सुरू होतो. माणसाचा मेंदू हा सुपर कॉम्प्युटर आहे. त्यामध्येही ठरावीक भाग असा असतो, जो आपण गाढ झोपेतून जागे झाल्याक्षणी काम सुरू करतो.

डिफॉल्ट मोड नेटवर्क हा शब्द २००१ साली प्रथम वॉशिंग्टन विद्यापीठातील डॉ. मार्कस राय्चल यांनी वापरला. माणूस कोणतीही कृती करीत नसताना, विचारात मग्न असताना मेंदूतील हा भाग सक्रिय असतो; पण तो एखादी कृती लक्षपूर्वक करू लागला की, या भागातील सक्रियता कमी होते, असे त्यांनीच दाखवून दिले.

आपण कोणतेही शारीरिक काम करीत नसतो किंवा एखादे काम यांत्रिकतेने करीत असतो, त्यावेळी मेंदू विचारांच्या आवर्तात बुडालेला असतो. एका विचारातून दुसरा विचार अशी ही साखळी चालू राहते, शरीर स्थिर असले तरी मन इतस्तत: भटकत असते.

आपला मेंदू भूतकाळातील आठवणीत किंवा दिवास्वप्ने पाहण्यात गुंतलेला असतो. त्यासाठीच मेंदूत ऊर्जा वापरली जात असते. विचार करणे हेच माणसाच्या मेंदूचे महत्त्वाचे काम आहे; पण ते काम सतत होत राहिले तर मेंदू थकतो, कंटाळतो, नैराश्याचा शिकार होतो.

मेंदूतील या भागाला विश्रांती कधी मिळते, माहीत आहे?

माणूस एखादी शरीर कृती लक्ष देऊन करू लागतो किंवा तो शरीराने काम करीत नसला तरी माइंडफुल असतो, सजग असतो त्यावेळी मात्र हा भाग शांत होतो आणि टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क (टीपीएन)सक्रिय होते. श्रमजीवी माणसात ज्यावेळी त्यांचे त्यांच्या कामावर पूर्ण लक्ष असते. त्यावेळी डिफॉल्ट मोड नेटवर्कला थोडी विश्रांती मिळते.

कुंभार त्याचे मडके तयार करीत असतो, त्यावेळी त्याच्या मेंदूतील हा मोड बदलला जात असतो. कारण मडके करण्याच्या कृतीवर त्याला एकाग्र व्हावे लागते.

बुद्धिजीवी माणसात मात्र असे होत नाही. शिकवताना, हिशेब करीत असताना किंवा कॉम्प्युटरवर काम करीत असताना मेंदूत विचार असतातच. किंवा तुम्ही मिक्सरमध्ये चटणी वाटत असता, त्यावेळी मेंदूतील विचार चालूच राहतात आणि डिफॉल्ट मोड काम करीतच राहतो. मग त्याला विश्रांती कशी मिळेल?

सजगतेने आपण ज्यावेळी श्वासामुळे होणारी छाती किंवा पोटाची हालचाल जाणतो किंवा त्याक्षणी येणाऱ्या बाह्य आवाजावर लक्ष केंद्रित करतो, त्यावेळी डिफॉल्ट मोड शांत होतो. माणूस श्वासाचा स्पर्श जाणू लागतो, त्यावेळी त्याच्या मेंदूतील टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क काम करू लागते.

आपल्या मेंदूच्या लॅटरल प्रीफ्रन्टल कॉरटेक्समध्ये लक्ष केंद्रित करणारे केंद्र असते, ते यामुळे सक्रिय होते. श्वासामुळे होणारी छातीची किंवा पोटाची हालचाल तुम्ही जाणत असता, त्यावेळी मेंदूतील इन्सूला नावाचा भाग सक्रिय होतो आणि डिफॉल्ट मोड शांत होतो. मन काही क्षण वर्तमानात राहते, त्यावेळी मेंदूतील विचार करणाऱ्या भागाला विश्रांती मिळते.

विचार करणे हेच माणसाच्या मेंदूचे वैशिष्ट्य आहे; पण सतत येणारे विचार मेंदूला थकवतात. तो थकवा दूर करण्यासाठी काही काळ हा ‘डिफॉल्ट मोड’ बदलणे आवश्यक आहे.

त्यासाठीचा एक साधा उपाय हे करून पहा:

शांत बसा. एक हात छातीवर, दुसरा पोटावर ठेवा. तुम्ही काहीही करीत नसलात तरी तुमचे शरीर श्वासोच्छ्वास करते आहे. त्यामुळे छाती किंवा पोट हलते आहे. तुमचे सर्व लक्ष तुमच्या हातांवर ठेवा आणि नैसर्गिक श्वासामुळे छाती अधिक हलते आहे की पोट हे जाणा.

ज्यावेळी ही हालचाल समजते, त्यावेळी तुमच्या मेंदूतील डिफॉल्ट मोड शांत झालेला असतो, त्याला विश्रांती मिळत असते. जो श्वास तुम्हाला समजतो, तो चांगला श्वास, गुड ब्रेथ.

असा गुड ब्रेथ मेंदूला ताजेतवाने करतो. दिवसभरात किमान तीन-चार वेळा श्वासाची हालचाल जाणायची असे ठरवता येईल?

अर्धा मिनिट, एक मिनिट, पाच – दहा श्वास, त्यावर लक्ष केंद्रित केलेत, की मेंदूतील डिफॉल्ट मोडला विश्रांती मिळून तुम्ही ताजेतवाने व्हाल. किती साधा आणि सोपा उपाय आहे!

फक्त त्याची आठवण होणे थोडेसे अवघड आहे. दर दोन तासांनी काही सजग श्वास घ्यायचे असा संकल्प करून त्यासाठी प्रयत्न करून पहा…

लेखक :डॉ. यश वेलणकर

प्रस्तुती :श्रीमती राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वास्तुपुरुषास पत्र… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ वास्तुपुरुषास पत्र… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

वास्तुपुरुषास,

साष्टांग नमस्कार विनंती विशेष.

 

झालं असं की, एकजण घरी आले होते. ते बोलता बोलता म्हणाले, “वास्तू प्रसन्न आहे हं तुमची.”आणि तुझी प्रथमच प्रकर्षाने आठवण झाली.

तुझी शांत करून जमिनीत पुरून जेवणावळी केल्या, की तुला विसरूनच जातो रे आम्ही.मग उरते फक्त  घर. तुझ्या खंबीर पाठिंब्याकडे अगदी पूर्ण कानाडोळा !

अगदी अपराधी वाटलं. मग काय, तुझ्याशी पत्र संवाद करण्याचं ठरवलं. म्हणून आज हे परत एकदा नव्याने पत्र!

 

तुझ्याविषयी विचार करताना कितीतरी गोष्टी प्रथमच लक्षात आल्या. जिथे तू प्रसन्नपणे वावरतोस, ते घरकूल खरंच सोडवत नाही.

घरात बसून कंटाळा येतो, म्हणून प्रवासाला म्हणजे पर्यटनाला गेलो, तर 4 दिवस मजेत जातात. पण नव्याची नवलाई संपते आणि घराची ओढ लागते.

आजारपणात डॉक्टर म्हणतात-आराम व्हावा म्हणून ऍडमिट करा. पण तुझ्या कुशीत परतल्याशिवाय कोणाच्याही प्रकृतीला आराम पडत नाही, हेच खरं.

 

तुझ्या निवाऱ्यात अपरिमित सुख आहे.

 अंगणातील छोटीशी रांगोळी स्वागत करते , दारावरच तोरण हसतमुखाने सामोरं येतं ,

 तर उंबरा म्हणतो, ‘थांब. लिंबलोण उतरू दे.’

 बैठकीत विश्वास मिळतो तर माजघरात आपुलकी. स्वैपाकघरातील प्रेम तर दुधाच्या मायेनं ऊतू जातं !

 तुझ्या आतल्या देव्हाऱ्यात बसलेली मूर्ती मनातील भीती पळवून लावते.

 खरंच वास्तुदेवते, या सगळ्यांमुळे तुझी ओढ लागते.

 

तुझी शिकवण तरी किती बहुअंगी! खिडकी म्हणते, ‘दूरवर बघायला शिक.’

दार म्हणतं, ‘येणाऱ्याचं खुल्या मनाने स्वागत कर.’

भिंती म्हणतात, ‘मलाही कान आहेत. परनिंदा करू नकोस.’

छत म्हणतं, ‘माझ्यासारखा उंचीवर येऊन विचार कर.’

जमीन म्हणते, ‘कितीही मोठा झालास तरी पाय माझ्यावरच असू देत.’

तर बाहेरचं  कौलारू छप्पर सांगतं, ‘ स्नेहाच्या पंखाखाली सगळ्यांना असं काही शाकारून घे की बाहेर शोभा दिसेल आणि  आत ऊन, वारा लागणार नाही.’

 

इतकंच नाही तर तू घरातील, मुंग्या, झुरळ, पाली, कोळी  यांचाही आश्रयदाता आहेस. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्थाही बघतोस आणि

निसर्गाच्या अन्नसाखळीला हातभार लावतोस. इतकं मोठं मन आमचंही व्हावं, असा आशीर्वाद दे.

 

तुझ्या वाटणीसाठी दोन भाऊ कोर्टात जातात आणि वकिलाची घरं उभी रहातात, याचं खरंच वाईट वाटतं.

एकत्र कुटुंबपद्धतीकडून एकल कुटुंबपद्धतीकडे वेगाने निघालो आम्ही, पण तरीही शेवटी ‘घर देता का कोणी घर’ ही नटसम्राटाची घरघर काही संपली नाही रे !

 

कारण जिथे तुझ्या प्रसन्नतेच्या  खाणाखुणा नाही, ते घर नसतं. बांधकाम असतं रे विटा मातीचं!

 

पण एक मात्र छान झाले की लॉकडाऊनमुळे ज्या सामान्य माणसाने तुला उभारण्यासाठी जिवाचे रान रान केले ना, त्याला तू घरात डांबून, घर काय चीज असते,ते मनसोक्त उपभोगायला लावलेस रे.

खरंच. हा अमूलाग्र बदल कोणीच विसरणार नाही रे.

 

वास्तू देवते, पूर्वी आई-आजी सांगायची, ‘शुभ बोलावं नेहमी. आपल्या बोलण्याला वास्तुपुरुष नेहमी ‘तथास्तु’ म्हणत असतो.’

मग आज इतकंच म्हणतो की, ‘तुला वस्तू समजून विकायचा अट्टहास कमी होऊन तुझ्या वास्तूत वर्षातून काही क्षण तरी सगळी भावंडं,मित्रमैत्रिणी, आप्तेष्ट  एकत्र वास्तव्यास येऊ देत.’

आणि या माझ्या मागण्याला तू ‘तथास्तु’ असंच म्हण, हा माझा आग्रह आहे .

 

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : श्री. मंगेश जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आपली उपासना फळ का देत नाही?… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्वाती मंत्री ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आपली उपासना फळ का देत नाही?… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्वाती मंत्री ☆

मुळात आपण ज्या नगण्य प्रमाणात उपासना करतो, बढाया मारतो व देवाकडून अखंड अपेक्षा ठेवतो, ते खरे पाहता हास्यास्पद आहे, याची जाणीव या लेखात होते.

माधवाचार्य हे थोर गायत्री उपासक. वृंदावनात त्यांनी सलग तेरा वर्षे गायत्रीचे अनुष्ठान मांडलं. पण तेरा वर्षांत अब्जावधीचा जप होऊनही ना त्यांना आध्यात्मिक उन्नती दिसली ना भौतिक लाभ. हतोत्साही होऊन ते काशीस आले आणि इथे तिथे पिसाटाप्रमाणे भटकू लागले.

तीन चार महिने असे गेल्यावर त्यांना एक अवधूत भेटला. परिचय वाढला, तसं माधवाचार्यांनी त्यांना आपली व्यथा बोलून दाखवली.

“आलं लक्षात! गायत्रीऐवजी तुम्ही कालभैरवाची उपासना एक वर्ष केलीत, तर तुम्हाला हवा तो लाभ नक्की होईल.”

अवधुतांचे बोलणे मनावर घेऊन माधवाचार्यांनी साधनेला सुरुवात केली. कोणताही दोष येऊ न देता त्यांनी वर्षभर साधना केली. कधी सुरू केली, हेही विसरलेले माधवाचार्य एक दिवशी उपासनेला बसले असताना त्यांना

“मी प्रसन्न आहे, काय वरदान हवे?” असं ऐकू आलं. भास म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं आणि उपासना चालू ठेवली.

“मी प्रसन्न आहे. काय वरदान हवे?”

पुन्हा भास समजून माधवाचार्यांनी उपासना सुरू ठेवली.

“मी प्रसन्न आहे. काय वरदान हवे?”

आता मात्र हा भास नाही याची खात्री झाल्यावर माधवाचार्यांनी विचारले,

“आपण कोण आहात? जे कोणी आहात, ते पुढे येऊन बोलाल? माझ्याद्वारे काळभैरवाची उपासना सुरू आहे.”

“ज्याची उपासना तू करत आहेस,तोच काळभैरव मी मनुष्यरुपात आलोय. वरदान माग.”

“मग समोर का नाही येत?”

“माधवा! तेरा वर्षे जो तू अखंड गायत्री मंत्राचा जप केलास, त्याचं तीव्र तेजोवलय तुझ्याभोवती आहे. माझ्या मनुष्यरूपाला ते सहन होणार नाही, म्हणून मी तूला सामोरा येऊ शकत नाही.”

“जर तुम्ही त्या तेजाचा सामना करू शकत नसाल, तर आपण माझ्या काहीच कामाचे नाहीत. आपण जाऊ शकता.”

“मी तुझे समाधान केल्याशिवाय जाऊ शकत नाही. मला जाताच येणार नाही.”

“तर मग, गेली तेरा वर्षांचं माझं गायत्री अनुष्ठान का फळले नाही? याचं उत्तर द्या.”

“माधवा! ते निष्फळ झालं नाही. ते अनुष्ठान तुझी जन्मोजन्मीची पापे  नष्ट करत होते. तुला अधिकाधिक निर्दोष करत होते.”

“मग आता मी काय करू?”

“परत वृंदावनात जा, अनुष्ठान सुरू कर. तुला अजून एक वर्ष करायचंय. हे एक वर्ष तुझं या जन्मातील पाप नष्ट होण्यात जाईल आणि मग तुला गायत्री प्रसन्न होईल.”

“तुम्ही किंवा गायत्री कुठे असता?”

“आम्ही इथेच असतो. पण वेगळ्या मितीत. हे मंत्र, जप आणि कर्मकांडे तुम्हाला आमच्या मितीत बघण्याची सिद्धी देतात. ज्याला तुम्ही साक्षात्कार म्हणता.”

माधवाचार्य वृंदावनात परतले. शांत, स्थिर चित्ताने पुन्हा गायत्रीचे अनुष्ठान आरंभले. एक वर्ष पूर्ण झालं. पहाटे उठून अनुष्ठानाला बसणार, तोच,

“मी आलेय माधवा! वरदान माग.”

“मातेssss”

टाहो फोडून माधवाचार्य मनसोक्त रडले.

“माते! पहिल्यांदा गायत्री मंत्र म्हटला तेव्हा खूप लालसा होती. आता मात्र काहीच नको गं. तू पावलीस तेच खूप.”

“माधवा! मागितलं तर पाहिजेच.”

“माते! हा देह नष्ट झाला तरी देहाकडून घडलेलं अमर राहील आणि ते घडेपर्यंत तू साक्षीला असशील, असं वरदान दे.”

“तथास्तु!”

पुढे तीन वर्षांत माधवाचार्यांनी ‘माधवनियम’ नावाचा अलौकिक ग्रंथ लिहिला. आजही तो ग्रंथ गायत्री उपासकांना मार्गदर्शक आहे.

लक्षात घ्या. जो काही मंत्र, जप, कर्मकांडं तुम्ही श्रद्धेने करता, त्याचा प्रभाव पहिल्या क्षणापासूनच सुरू होतो. पण तुमच्या देहाभोवती जन्मोजन्मीची पापे वेढे घालून बसलेली असतात. देवतेची शक्ती ही तिथे अधिक खर्ची होत असते. जसजसे तुम्ही उपासना वाढवता, तसतसे वेढे कमी होतात, शक्ती समीप येते आणि तुम्हाला वाटतं की ‘तेज’ चढलं. ते तेज म्हणजे खरंतर पूर्वकर्माच्या वेढ्यात झाकोळलेलं तुमचं मूळ रूप असतं.

लेखक :अज्ञात

संग्राहिका : सुश्री स्वाती मंत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मदत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मदत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

एखाद्याला मदत करण्याची कृती आपण स्वतः करतो की ती आपल्याकडून करवून घेतली जाते?

दोन्ही प्रश्नाचे उत्तर’ हो’ असेच असेल, नाही का?   तर मदतीच्या कृतीबाबतचा एक किस्सा असा….

आर्ट ऑफ लिविंगचा बेसिक कोर्स करत असताना एकदा आम्हाला सांगितले की ‘आता पुढची 15 मिनिटं या हॉलच्या बाहेर जा आणि कुणाला तरी मदत करून या. ‘  वेळ सुरू झाला आणि आम्ही बाहेर पडलो.

आमची मदत घेण्यासाठी कोणी दिसते का, शोधू लागलो. रस्ता रहदारीचा होता. एक आजी हातात जड पिशवी घेऊन चालत होत्या. आमच्यापैकी एक जण धावतच तिथे गेला आणि अगदी विनयाने म्हणाला, ‘आजी कुठे जायचे तुम्हाला? थोडे अंतर मी पिशवी घेतो. ‘ त्याच्या या बोलण्यावर आजी संशयाने बाजूला झाल्या आणि चढ्या आवाजात म्हणाल्या, ‘बाजूला हो. आला मोठा मदत करणारा’. एक प्रयत्न तर फसला.

वेळ आता दहाच मिनिटं उरला होता. पुन्हा शोधाशोध सुरू. रस्त्याच्या कडेला मळकटलेल्या कपड्यातली एक गरीब मुलगी दिसली. आम्ही तिकडे धावलो. शेजारीच वडापावचा गाडा होता. तिला म्हणालो, ‘चल. तुला वडापाव खायला देतो. ‘ त्यावर ती  आमच्याकडे संशयाने पाहू लागली. ‘नको नको’ म्हणत दूर पळून गेली.

आता पाच मिनिटे राहिली. शेवटी वडे तळणाऱ्या बाईंना आमच्या टास्कबद्दल सांगितले. आणि ‘तुम्हाला काही मदत करू का’ असे विचारले. त्यावर त्यांनीही नकार दिला, ‘माझे वडे बिघडवून ठेवाल, ‘ असे म्हणाली. वेळ संपला आणि कुणालाही मदत न करता आम्ही परत आलो.

आल्यावर सरांना सर्व वृत्तांत सांगितला. त्यावर ते म्हणाले, “आता तुमच्या लक्षात आले असेल. मदत करण्यासाठी तुमची निवड व्हावी लागते. कुणीही मदत करू शकत नाही, मदत तीच व्यक्ती करते जिची परमेश्वराने निवड केलेली असते. त्यामुळे इथून पुढे आयुष्यात जर कुणाला तुमच्या माध्यमातून मदत झाली तर ‘मी केली’असे म्हणू नका. ती परमेश्वराने केलेली असते. पण कृतीचे माध्यम म्हणून तुम्हाला निवडले आहे, हे विसरू नका. आणि त्याच्या  इच्छेशिवाय हे शक्य नाही, हे ध्यानात ठेवा. “

ही शिकवण त्यानंतरच्या प्रत्येक मदतीच्या कृतीवेळी मला आठवत राहिली. आणि आपण फक्त माध्यम आहोत, हे सतत जाणवत राहिले. यामुळे ‘अहंकाराचा वारा’ काही प्रमाणात का असेना थोडा दूर रहातो हे मात्र नक्की.

लेखक :अज्ञात

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ खरी श्रीमंती – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ खरी श्रीमंती – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

आमच्या लहानपणी इंग्रजीचं फॅड अजिबात नव्हतं.

ABCD …….XYZ याचा संबंध फक्त शाळेत गेल्यावर , ते ही इंग्रजीच्या तासालाच !

आणि आता

ABP माझा, CID, MRI, X-ray, Z-TV विचारूच नका .

आमच्या लहानपणी ,

This is Gopal . अन That is Seeta .ही दोन वाक्यं पाचवीत गेल्यावर वाचता आली,तरी जबरदस्त कौतुक व्हायचं !

आई लाडानं जवळ घ्यायची आणि मायेनं मुका घ्यायची. आई लेकराकडे इतक्या कौतुकाने पहायची की त्या पोराला एकदम कंडक्टर झाल्या सारखंच वाटायचं !

 

अहो, कंडक्टर याच्यामुळे की …..आमच्या लहानपणी एखाद्या पोराला मोठ्या माणसाने ,

“हं! काय रे बाळ मोठेपणी तू काय होणार ?” असा प्रश्न विचारला की ते पोट्टं हमखास म्हणायचं …..

“मी मोठेपणी कंडक्टर होणार किंवा पोलीस होणार !”

तुम्हाला खोटं वाटेल, मॅट्रिकचा निकाल लागल्यावर तुला किती परसेंटेज मिळालं,असा प्रश्न कोणीही कुणाला विचारत नव्हतं.

फक्त एवढंच विचारायचे ….

“पहिल्या झटक्यात पास झालास ना ?”

आणि आपण “हो” म्हणताच अख्ख्या गावाला आनंद व्हायचा !

म्हणजे पहा सुखाच्या , आनंदाच्या , मोठं होण्याच्या कल्पना किती छोट्या होत्या !

लक्षात घ्या. ज्या ज्या गोष्टीचा विस्तार होतो , त्या त्या गोष्टीतून दुःखच होतं .

तुम्ही बघा. पूर्वी गाव

 छोटं , घर छोटं , घरात वस्तू कमी , पगार कमी , त्याच्यामुळे शेवटचा आठवडा हमखास तंगी.

उसनंपासनं केल्याशिवाय प्रपंच होऊच शकत नव्हता. तरीही मजा खूप होती!

 

तुम्ही आठवून पहा. गल्लीतली एकही बाई किंवा माणूस हिरमुसलेलं किंवा आंबट चेहऱ्याचं नव्हतं !

उसनंपासनं करावंच लागायचं.

साखऱ्या , पत्ती , गोडेतेल , कणिक या गोष्टी गल्लीत एकमेकांना उसन्या मागणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्कच होता.

त्यामुळे कोणाकडे ‘हात पसरणे’ म्हणजे काहीतरी गैर आहे, असं आम्हाला कधी वाटलंच नाही .

उलट या गोष्टींची इतकी सवय होती की कोणत्याच गोष्टीचा कमीपणा वाटत नव्हता.

डोकं दुखल्यावर शेजाऱ्याकडे अमृत अंजनचं एक बोट उसनं मागायलासुद्धा अजिबात लाज वाटली नाही .

घरातल्या वडील माणसासाठी 10 पैश्याच्या तीन मजूर बिड्या किंवा 15 पैशाचा सूरज छाप तंबाखूचा तोटा आणतानाही मान कशी ताठ असायची !

 

कोणतीच गोष्ट कोणापासून लपून रहातही नव्हती आणि तसा प्रयत्नही फारसा कुणी करत नव्हतं !

गल्लीत एखाद्या पोरीला पाहुणे पहायला येणार, ही बातमी लपून राहूच शकत नव्हती.कारण शेजाऱ्या-पाजाऱ्याकडून पोह्याच्या प्लेट , चमचे , बेडशीट ,

 तक्के , उशा , दांडी असलेले कपं आदी साहित्य मागून आणल्याशिवाय ‘पोरगी दाखवायचा  कार्यक्रम ‘ होऊच शकत नव्हता !

आणि मित्र हो हीच खरी श्रीमंती होती , ते आत्ता कळतंय !

आणि हल्ली शेजाऱ्याच्या मुलीचं लग्न होऊन जातं, तरीही कळत नाही !

जेंव्हा Status वर डान्सचा व्हिडीओ येतो तेव्हा कळतं , अरे लग्न झालं वाटतं !

 

हे सगळं लिहिण्यामागचा एकच उद्देश आहे –

भेटत रहा , बोलत रहा , जाणे-येणे ठेवा , विचारपूस करा .

जेवलास का ?

झोपलास का ?

सुकलास का ?

काही दुखतंय का ? असे प्रश्न विचारताना लागलेला मायेचा , काळजीचा , आपुलकीचा कोमल     स्वरच जगण्याचं बळ देत असतो !

माणसाशिवाय ,    गाठीभेटीशिवाय , संवादाशिवाय काssssही खरं नाही !

कवी :अज्ञात

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आई…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “आई…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सुंदर, शिडशिडीत दिसणे ही स्त्रीसुलभ भावना बाजूला ठेवून आपल्या पोटात असलेल्या जिवाला वाढायला जागा देताना आपल्या पोटाच्या वाढत्या आकाराचा विचार बाजूला पडतो आणि आरशात वाढलेल्या पोटाच्या जागी आतला जीव दिसून समाधान वाटते, तेव्हा स्त्रीची आई होते.

नऊ महिने बाळाला काय योग्य आणि अयोग्य आहे, त्यानुसार आहार, व्यायाम, व्यवहार करून त्याच्या येण्याच्या आधीपासून स्त्रीचं आयुष्य त्याच्याभोवती फिरू लागतं, तेव्हा स्त्रीची आई होते.

नऊ महिने भरल्यावर जगातील सर्वांत जास्त वेदनांपैकी एक असलेली प्रसूतीची वेदना बाळाच्या आवाजाने,दर्शनाने क्षणात विसरते, तेव्हा स्त्रीची आई होते.

बाळाला आपल्या मायेने ओतप्रोत भरलेला जगातील सर्वांत सकस आहार, आईचे दूध पाजताना तिला परमोच्च दैवी  आनंदाची अनुभूती होते, तेव्हा स्त्रीची आई होते.

बाळाची शी, शू, लाळ, ओकाऱ्या असंख्यवेळा साफ करताना आणि आपल्या अंगावर झेलताना घाण वाटायच्याऐवजी शीचा रंग किंवा पोत बदलला की लगेच काळजी वाटते, तेव्हा स्त्रीची आई होते.

मुलांबरोबर खेळताना, त्यांचे सर्व करताना स्वतःचे छंद, आवडी, मित्रमैत्रिणी, नातेवाईक आणि अस्तित्वच विसरते, तेव्हा स्त्रीची आई होते.

जगापासून, त्यातील वाईट लोक आणि प्रवृत्तींपासून मुलाचा सांभाळ करताना हळवी, प्रेमळ, मितभाषी असलेली स्त्री देखील  प्रसंगी दुर्गा बनू शकते तेव्हा स्त्रीची आई होते.

अपत्यजन्म, संगोपन ह्या चक्रातून अनेकदा जावे लागले, तरी तिच्या मायेच्या डोहाचे पात्र प्रत्येक अपत्याला आधीच्या सर्वांबरोबर डुंबता येईल इतके विशाल होत जाते, तेव्हा स्त्रीची आई होते.

मुले मोठी झाली, आपापल्या मार्गी लागली की आयुष्याची इतिकर्तव्यता पूर्ण झाल्याचे समाधान मिळते, तेव्हा स्त्रीची आई होते.

मुलांनी उतारवयात विचारले नाही, आपल्या उभ्या आयुष्याची गुंतवणूक बोगस कंपनीत झाली, हे लक्षात आले तरी मुलांचे फक्त चांगले चिंतत त्यांची सतत काळजी करणारे ह्रदय बनते, तेव्हा स्त्रीचे आई होते.

स्त्री ही अनंत काळची माता आहे असे म्हणण्याचे कारण  कदाचित तिची आई म्हणून मुलांना असलेली गरज अनंतकाळ टिकणारी आहे!

आम्हा तमाम गरजवंत बाळांतर्फे तमाम मातांना  शुभेच्छा!

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ घड्याळ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ घड्याळ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

जेवताना सहज घड्याळाकडे लक्ष गेले. आजपर्यंतच्या आयुष्यात घड्याळ किती वेळा पाहिले हे मोजताही येणार नाही. पण आज पाहिले आणि घड्याळयाच्या तीन काट्यात आणि परिवारात काही तरी साम्य जाणवले.

घड्याळ्यात तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा असतो. तसेच परिवारातील तास काटा म्हणजे वडील, मिनिट काटा म्हणजे आई व सेकंद काटा म्हणजे मुलं असल्याचे जाणवले.

या प्रत्येक काट्याला फिरण्याची आपली गती आहे, प्रत्येकाची गती वेगळी आहे, पण दिशा मात्र एकच आहे. पण प्रत्येकाच्या गतीचे एक वर्तुळ पूर्ण झाल्याशिवाय सेकंद, मिनिटे आणि तास पूर्णत्वास येऊ शकत नाहीत .

परिवारात वडील म्हणजे तास काटा. याची गती सगळ्यात कमी असली तरीही तो एका ठाम गतीने व उद्देशाने पुढील तासाच्या आकड्याकडे सरकत असतो. पण तास पूर्ण झाल्याशिवाय त्याची गती लक्षातच येत नाही. त्याच प्रमाणे वडिलांचे काम असते. ते एक एक ध्येय डोळ्यासमोर ठेऊन ठामपणे आपला प्रवास करीत असतात.

पण ते घरातल्या कोणाच्याच लक्षात नसते.

ध्येय पूर्ण झाल्यावरच त्यांची गती लक्षात येते.

तोपर्यंत वडिलांचे महत्त्व लक्षात येत नाही.

आई म्हणजे मिनिट  काटा असते.प्रत्येक मिनिटाला (अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत) तिची गती जाणवत असते. ती सतत चालत, विचारमग्न, आणि कार्यमग्न असते. मिनिट काटा जसा घड्याळ्यात फिरताना कधी तास काट्याच्या मागे असतो, थोड्या वेळाने थोडा काळ तो तासकाट्या बरोबर थांबतो व नंतर परत तास काट्याला मागे टाकून त्याची ओढ सेकंद काट्याकडे असते. अगदी तसेच आईचे असते. सतत कामात असताना नवऱ्याच्या मागे पडल्यावर ती पुढे येऊन नवऱ्याला गाठून काही काळ नवऱ्याच्या बरोबरीने काम करते व नंतर परत मुलांचे सगळे करायचे आहे, या प्रेमापोटी मुलांच्या (सेकंद काट्याच्या) मागे जाऊन त्यांच्या बरोबरीने राहण्याचा प्रयत्न करते.

आणि सेकंद काटा म्हणजे लहान मुलं.ती कितीही मोठी झाली तरीही आईवडिलांच्या मागे पुढे कायम उत्साहाने तुरुतुरु पळताना, खेळताना, बागडताना दिसतात. ती सतत तास काटा आणि मिनिट काटा (वडील, आई) यांच्या मधेच धडपडताना दिसतात. त्यांचा पुढे पुढे सरकण्याचा वेगही वडील आणि आई यांच्यापेक्षा जास्त असतो.

जसे घड्याळाला तीन काटे व त्यांच्या एकाच दिशेच्या गतीशिवाय पूर्णत्व येत नाही, तसेच अगदी आपल्या कुटुंबाचे आहे. या तीन काट्यांप्रमाणे आपल्या कुटुंबातील वडील, आई,आणि मुलं या़ची गती एकाच दिशेनं असल्याशिवाय घराला पूर्णत्व येत नाही.

पण हे लक्षात ठेवा की सेकंद, मिनिटे, तास या मुळे दिवस, आठवडे, महिने, वर्षे हे पूर्ण झाले तरी यासाठी काटे आपली चौकट (घड्याळाची तबकडी) सोडत नाहीत. तशीच आपण आपल्या कुटुंबाची चौकट सांभाळायला पाहिजे.

 एक जरी काटा चुकला तरी वेळ चुकते,  तसेच कुटुंबातील एक जरी सदस्य (काटा) चुकला

 तर कुटुंबाचे घड्याळ बिघडून गोंधळ उडेल.

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘मेंटेनन्स’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘मेन्टेनन्स’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

सकाळ पासून अनेक मेसेज WA वर येत असतात. बरेचदा आपण वाचतो आणि सोडून देतो. पण काही मेसेजेस विचार करायला लावतात. त्यातलाच हा मेसेज-

‘May  it be a Machine or Human Relationship,

Maintenance is always cheaper than repairing. ‘

अगदी खरंय. मशीनची efficiency टिकून राहावी, वाढावी म्हणून आपण नियमितपणे मशीनची देखभाल करतो. कधी थोडेसे जरी दुर्लक्ष झाले तरी मशीन आपल्याला इंडिकेशन द्यायला लागते. तत्परतेने आपण मशीन मधला fault शोधून रिपेअर करतो.

नात्यांचे पण तसेच आहे.

आपल्या अवतीभवती अशी कितीतरी जणं असतात, जी सर्वांच्या नेहमी संपर्कात असतात, आवर्जून फोन करतात, विचारपूस करतात, अधूनमधून प्रत्यक्ष भेटतात सुद्धा. काहींना  वाटतं, ही माणसं रिकामी आहेत. त्यांच्याकडे खूप वेळ आहे. तर तसं अजिबात नाही. या व्यक्ती आपल्या रोजच्या व्यापातूनसुद्धा दुसऱ्यासाठी वेळ काढतात. कारण त्यांच्या लेखी नाती महत्त्वाची असतात.

कित्येकांच्या घरी रात्रीचे जेवण घरातील सर्व सदस्यांनी एकत्र घ्यायची प्रथा आहे. मूळ उद्देश हाच की सगळे जण दिवसभरातून एकदा तरी एकमेकांना भेटतात. विचारपूस होते. विचारांची देवाण घेवाण होते. काही समस्या असतील तर त्याचे निराकरण होते. हाच routine maintenance. अशाने नाती टिकून राहतात. एकमेकांबद्दल आदर, प्रेम वाढते. आपली माणसे आपल्यासोबत आहेत, हा विचारसुद्धा खूप महत्त्वाचा असतो.

माझ्या कॉलेज /शाळेच्या ग्रुपमध्ये काहीजण आवर्जून प्रत्येकाच्या वाढदिवशी त्याला फोन करतात. काही जण सोबतचे फोटो शेअर करतात. काही जण कविता किंवा लेख लिहितात.

मला आठवतंय, लहानपणी दर १५ दिवसांनी, महिन्यांनी आजीचे, काकांचे पत्र यायचे, खुशालीचे.

आपल्या पिढीनेही पाहिली असतील पत्रे आलेली. आपणसुद्धा लिहिली आहेत पत्रं. बाहेरगावी किंवा नोकरीच्या ठिकाणाहून.

किती भारी वाटायचं ना पत्र आले की!काळाच्या ओघात पत्रं बंद झाली. आणि त्यांची जागा WA ने घेतली.

कोणी म्हणेल, कशाला करायचा फोन?इथे आपल्याला आपल्या कामाचे व्याप आहेत. आणि मी नाही केला कॉल, मी नाही केली चौकशी तर काय फरक पडणार आहे?

तसे पाहिले तर फरक काहीच पडणार नसतो. पण आपल्या एका फोनने  नात्याचे बंध अधिक घट्ट होतात. समोरच्या व्यक्तीच्या आनंदासाठी आपण केलेली कृती म्हणजेच Preventive मेन्टेनन्स.

म्हणूनच Machine सारखाच नात्यांचा Maintenance हवाच.

लेखक  :अज्ञात

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काही विचार… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ काही विचार… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक 

  • परफेक्ट जोड्या फक्त चपलाच्या असतात. बाकी सगळ गैरसमज आहे.
  • कचरापेटीत पडलेली भाकरीच सांगते की माणूस पोट भरलं की त्याची लायकी विसरतो.
  • जेवताना शेतकऱ्याचे आणि झोपताना सैनिकाचे आभार मानायला विसरू नये.
  • कोणतेही कर्म करा, पण एक गोष्ट विसरु नका. परमेश्वर नेहमी ONLINE असतो.
  • SORRY माणसाने म्हटले की भांडण संपते आणि डॉक्टरनी म्हटले की माणूस संपतो.
  • नातं हृदयातून असावं. रक्ताची नातं हल्ली वृद्धश्रमात सापडतात.
  • लाकडाच्या ओंडक्यांनी भरलेल्या ट्रकच्या फळीवर लिहिले होते ‘झाडे लावा झाडे जगवा. ‘
  • नाती जिवंतपणीच सांभाळा. ताजमहल जगाने पाहिला, पण मुमताजने नाही.
  • चमचा ज्या भांडयात असतो, त्यालाच तो रिकामा करतो. चमच्यापासून सावध रहा.
  • उपवास नेहमी अन्नाचाच का करता? कधी कधी क्रोधाचा आणि वाईटाचाही करा.
  • भावना ही जगातील सर्वात खतरनाक नदी आहे. ह्यात सगळे वाहून जातात.

लेखक :अज्ञात

प्रस्तुती :सौ. उषा नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares