मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वेळीच टकटक ऐकायला शिका… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ वेळीच टकटक ऐकायला शिका… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

(लहानपणीची अर्धी राहिलेली गोष्ट)

एक होती चिमणी आणि एक होता कावळा. 

चिमणीचं घर होत मेणाचं, याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं. 

एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाटयाचा वारा सुटला. टप् टप् पाऊस पडू लागला. झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वहायला लागलं. 

कावळयाच घर होत शेणाचं, ते गेले  पाण्यात वाहून, कावळा काकडला. आता कुठे जावं बरं ? एवढयात त्याला आठवलं, चिमणीचं घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे. 

.. पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. 

‘ चिऊताई, चिऊताई, दार उघड ! ‘ 

चिमणी आतून म्हणाली ‘ थांब माझ्या बाळाला काजळ-पावडर लावते ‘

 थोडावेळ थांबून पुन्हा कावळयाने कडी वाजवली ‘ चिऊताई, चिऊताई, दार उघड ! ‘ 

चिमणी आतून म्हणाली ‘ थांब माझ्या बाळाला झोपवते ‘ 

इकडे कावळयाला खूप भूक लागली होती. पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा ! एवढंस तोंड करून कुडकुडत उभा राहिला. पण चिमणीने काही केल्या दार उघडले नाही.

 गोष्टीचा पुर्ण केलेला उत्तरार्ध – 

चिमणीचे सगळे काम आटोपले. ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की, 

अरेच्च्या ! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही. 

तिला विलक्षण अपराधी वाटलं. 

तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. 

ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता.

‘ गेला असेल कुठेतरी… येईल परत ‘ …. तिने स्वत:च्या मनाची समजूत काढली. 

मात्र, रात्र मावळली… दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता. 

चिमणीचं मन आज कशातच रमेना … बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध-पावडर करण्यातही नाही … 

कारण एव्हाना तिला सवय झाली होती …. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची …… 

तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं… 

अनेक दिवस उलटले …

चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना. 

मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दरमजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली. 

एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला… 

तो ‘कावळ्याचा’ आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला काय आनंद झाला. सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला. तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पहाते तर काय ! 

…. कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता. 

कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला, 

‘ या या चिमणाबाई. तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी? ‘ 

कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली. म्हणाली,- ‘ तुला राग नाही आला माझा? ‘

‘ का यावा? ‘

‘ मी माझ्यात विश्वात गुंग होते म्हणून?’

‘ छे छे! प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं.. जसं तुझं होतं. तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती .

तर माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. 

माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येऊन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या दोन्हीही गोष्टी ‘अतिक्रमणासारख्याच’ घडल्या असत्या नाही का? आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर ‘अतिक्रमण’ करणे चूकच नाही का? म्हणून मग मी स्वत:च वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच …. तुझ्या विश्वापासून दूर.’ 

-’ पण मला एकटे करून? अरे, कावळेदादा मला सवय झालीय आता तुझी.’

‘ चिमणाबाई, या जगात एकटे कोणीच नसतं. जेव्हा आपण एकटे आहोत असं वाटतं ना तेव्हा तो एकांतच आपला सोबती असतो,. जो दाखवत असतो आपल्याला आपल्या आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची वाट… 

मलाही दाखवली त्याने आणि बघ ……. आज मी किती आनंदी आहे … माझ्या ‘घरट्यात… माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या ‘माझ्या माणसांमध्ये’ ‘

चिमणी नि:शब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला –

‘ चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल … क्षणाचाही विलंब न करता.’ 

चिमणीचे डोळे पाणावले… भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली आपल्या घरट्याकडे… 

पण आज तिच्या पंखात पूर्वीइतकं बळ राहिलं नव्हतं….

आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिमणाबाई सारखी झालीय. 

– म्हणजे ?

– म्हणजे कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साद घालतंय हे आपल्या ध्यानीच नसतं. 

ह्या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहिण, मित्र, मैत्रीण,आई, वडील, बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात…

त्यांची आर्त साद आपल्याला ऐकूच येत नाही…. म्हणजे ते पोटतिडकीने साद घालतात आणि आपण म्हणतो ‘ .. …’थांब मला जरा  करिअर करु दे…. थांब जरा मला आता घर घ्यायचंय… थांब जरा मला आता कार घ्यायचीय … थांब मला काम आहे … थांब मला विश्रांती घ्यायची आहे … थांब जरा मला आता.. ….’ आणि मग ही जंत्री वाढतच जाते.

त्यांची सहन शक्ती संपते … ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात… त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं… आपल्या ते लक्षात नसतं आणि जेव्हा येतं तेव्हा …. आपण फार एकटे झालेले असतो…!!

– आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर? 

तर मग ‘ मला कोणाचीच  गरज नाही ‘ हा अहंपणा बाळगू नका. 

– वेळीच ‘टकटक’ ऐकायला शिका.

काहीतरी निमित्त करून एकमेकांना भेटत रहा…

कवी : अज्ञात 

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रश्नमंजुषा… अशीही… – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रश्नमंजुषा… अशीही… – अज्ञात  ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

प्रश्नमंजुषा… अशीही.

जराशी गम्मत ….. बघा तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळतात का?

१. पगाराला दोनने ‘गुणले’ तरी 

‘भागत’ का नाही ?

२. लग्नाची ‘बेडी’ नक्की 

कोणत्या गुन्ह्यासाठी ‘पडते’?

३. अक्कल ‘खाते’ 

कोणत्या बँकेत ‘उघडता’ येते?

४. ‘भाऊगर्दीत’ 

‘बहिणी’ नसतात का?

५. ‘बाबा’ गाडीत 

‘लहान बाळांना’ का बसवतात? 

६. ‘तळहातावरचा फोड’ 

किती मोठा होईपर्यंत ‘जपावा’?

७. मनाचे मांडे भाजायला

‘तवा’ का लागत नाही?

. ‘दुग्धशर्करा योग’ 

‘मधुमेहींना’ वर्ज असतो का? 

९. ‘आटपाट’ नगर 

कोणत्या ‘जिल्ह्यात’ येते? 

१०. ‘तिखट प्रतिक्रिया’ 

‘गोड’ मानून घेता येते का?

११. सतत ‘मान खाली’ घालायला लावणारा मित्र  ‘मोबाईल’ असावा कां? 

१२. ‘काहीही’ या पदार्थाची 

‘रेसिपी’ मिळेल का?

१३. ‘चोरकप्पा’ नक्की

‘कोणासाठी’ असतो? 

१४. ‘पालक’ ‘चुका’ दाखवून 

 मुलांना ‘माठ’ ठरवत असतात का?

१५. ‘पैशांचा पाऊस’ असेल

तर ‘छत्री’ उलटी धरावी का?

१६. ‘भिंतीला’ कान असतात

तर बाकीचे अवयव कुठे असतात?

(ज्यांना मराठीची मजा चाखता येते, त्यांच्यासाठी खास चेहरा खुलवणारी प्रश्नमंजुषा !)

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,

आज उगाचच खूप वर्षांनी आठवली !

शाळा तर कधीचीच संपलीय, पण,

परीक्षेची धडधड मात्र तशीच राहिलीय !!

 

“शब्दांचे अर्थ लिहा” म्हटल्यावर,

अचूक अर्थ आठवायचे !

आता अर्थही बदललेत आणि,

शब्दही अनोळखी झालेत !!

 

“समानार्थी, विरुद्धार्थी शब्द”,

गुण हमखास मिळायचे !

आता समानार्थी भाव, विरुद्धार्थी बनलेत,

अन् अर्थांचे अनर्थ झालेत !!

 

“गाळलेल्या जागा भरा”,

हा प्रश्न पैकीच्या पैकी गुण देणारा !

प्रश्नपत्रिकेतल्या सगळ्याच, 

गाळलेल्या जागा भरल्यात!

आयुष्यातल्या काही जागा मात्र,

आजही रिकाम्याच राहिल्यात !!

 

पेपरातल्या “जोड्या जुळवा”,

क्षणार्धात जुळायच्या!

पण नात्यांच्या जोड्या, 

कधी जुळल्या,तर कधी, 

जुळता जुळता फसल्या !

 

“एका वाक्यातल्या उत्तरा”नं पाच मिनिटात,

पाच गुण मिळवून दिलेत !

आयुष्यातले काही सोप्पे प्रश्न,

आजही तिथेच तटस्थ उभे आहेत,

एकाच जागी उत्तराची वाट बघत.

 

“संदर्भासहित स्पष्टीकरण” लिहिताच,

पाच पैकी साडेतीन गुण मिळायचेच !

आता स्पष्टीकरण देता देता

जीव जातो !!

 

“कवितेच्या ओळी पूर्ण” करणं,

अगदी आवडता प्रश्न!

आजही शोध सुरु आहे, 

कवितेच्या सुंदर ओळींचा !

एका चालीत, एका सुरात गाताना,

मिळेल कधीतरी, पूर्णत्व आयुष्याला !!

 

“निबंध लिहा”, किंवा “गोष्ट लिहा”,

पाचापैकी तीन गुण देणारच देणार !

आता कितीही कल्पना लढवा,

किंवा, म्हणींवरुन गोष्ट तयार करा,

पण त्याचा विस्तार मात्र नियतीच ठरवणार !!

 

तेव्हा अभ्यासक्रमावरुन परीक्षा द्यायचो !

काही प्रश्न “option” लाही टाकायचो !

आता परीक्षा आधीच द्यावी लागते,

अभ्यासक्रम मात्र नंतर कळतो !!

आयुष्याचा अभ्यासक्रम अनोळखी असतो,

आणि कुठलाच प्रश्न ऐच्छिक नसतो !!

 

शाळेत सोडवलेली मराठीची  प्रश्नपत्रिका,

आज उगाच खूप वर्षांनी आठवली.

तेव्हाची परीक्षा आज फारच सोप्पी वाटली !!

 

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ३६ आकडा आणि ६३ आकडा ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ३६ आकडा आणि ६३ आकडा ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

” ३६ आकडा आणि ६३ आकडा ”  हे दोन अंक शिकवतात जीवनातील सत्य स्वरूप . 

३६ आकड्याचा विचार केला तर, तीन आणि सहा दोन्ही आकडे एकमेकांकडे पहात नाहीत. दोघेही टाईट पणाने पाठीला पाठ लावून उभी आहेत. एकमेकांचं तोंडही पहात नाहीत.

त्याप्रमाणे माणसांचं असतं. छत्तीसचा आकडा हा चाळिशीच्या आतला आहे. म्हणून चाळीशीच्या आत माणूस सुद्धा अहंकाराने, ताकदीने, पैशाने, परिपक्व असल्यामुळे तो नेहमीच अहंकारी असतो. कमीपणा घेत नाही. मला गरज नाही, मी त्याचं तोंड पाहणार नाही, असे शब्द त्याच्या तोंडात असतात. सख्ये भाऊ पक्के वैरी होतात. आणि हातात हात न घेता पाठीला पाठ लावतात. 

आता ६३ आकडा पहा.

या आकड्याने साठी ओलांडल्यामुळे आता हे दोघेही नम्र झालेत. दोन्ही आकडे एकमेकांकडे पाहतात. हातात हात घेतात. एकमेकाला आलिंगन देतात. माणसाचं असंच असतं, एकदा साठी ओलांडली की, नम्र होतो. कारण ना ताकद, ना तारुण्य, ना पैसा, ना सत्ता, काहीच राहत नाही. म्हणून हा नम्र होतो. तुम्ही पहा, माणूस तरुणपणी बालपण विसरतो, लग्न झाल्यावर आई वडिलांना विसरतो, मुलं झाल्यावर भावांना विसरतो, पैसा आला की आपले नातेवाईक विसरतो, आणि म्हातारपणी, जेवढ्यांना विसरला होता त्यांची आठवण काढत बसतो. 

६३ च्या या आकड्याप्रमाणेच संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.    

वयाने कोणी कितीही लहान मोठा असू देत. वास्तवात तोच मोठा असतो, ज्याच्या मनात सर्वासाठी प्रेम, स्नेह व आदर असतो. आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका. तर,, तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा…!!

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मला आवडते तुमची कलरफुल जनरेशन… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ मला आवडते तुमची Colourful Generation…. लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

नात : “नानी, तू किती generations बघितल्या ?”

मी : “ मी न……. ५…… बघ हं… माझी आजी, माझी आई, मी, माझी मुलगी आणि माझी नात… तू…”

नात: ” यापैकी कोणती generation तुला सर्वात जास्त आवडते ?”

मी : “ तुझी…. “

नात : “ वॉव…. पण का ?”

मी: “ कारण ती सर्वात जास्त colourful आहे. ”

नात: “ म्हणजे कशी ?”

मी : “ म्हणजे असं….. की माझ्या आजीच्या पिढीचा एकच रंग होता… ‘ घर… घर काम, घरच्यांची सेवा आणि    घरी येणाऱ्यांचे आदरातिथ्य.

मग माझी आई… या घरकामाच्या रंगात अजून एक रंग वाढला…

तो म्हणजे शिक्षणाचा…. आणि या शिक्षणाबरोबर खेळ, कला, जवळपासचा समाज… यामुळे आईच्या जीवनात बरेच रंग आले.

मग माझी पिढी… माझ्या पिढीत उच्च शिक्षण आणि विस्तृत समाज यामुळे आमचं क्षितिज बरंच रुंदावलं…

 नवनवीन प्रयोग, प्रवाह, पाऊलवाटा तयार होऊ लागल्या… generation colourful होऊ लागली.

मग.. तुझ्या आईची generation………

Technology चा एक जबरदस्त रंग बाकी सगळ्या रंगांवर हावी होऊ लागला…. ‘स्पर्धेचा नवीनच रंग भराभर गडद होऊ लागला. नवनवीन पाश्चिमात्य रंग डोकावू लागले… जागतिकीकरणाचा पहाट-रंग क्षितिजावर दिसू लागला…

आणि त्यानंतर…

नात : “ मी….. पण माझीच generation तुला का आवडते ?”

मी: “ कारण आधीच्या सगळ्या रंगात घोळून आत्मविश्वासाचा प्रसन्न रंग  लेवून जन्मलेली तुझी पिढी…. technology ला तर तुम्ही आपली दासी बनवलयं… जग तुमच्या बोटांवर नाचतं…

ग्रहांच्या पलिकडे तुमचं क्षितिज विस्तारलयं…

समानता खऱ्या अर्थाने तुमच्या नसानसात भिनली आहे….

माझ्या आजीच्या ‘घर आणि संस्कार’  पासून ते…

तुमच्या ‘अवकाश’ या प्रचंड कक्षेतील सगळे ‘सुखद’ रंग जपण्याचा आणि ‘दु:खद’ रंगांशी झुंजण्याचा तुमचा ‘Cool’ रंग मला फार आवडतो……

तुमच्या या रंगात आधीच्या सगळया पिढ्या अक्षरशः न्हाऊन निघतात…

BE BOLD FOR CHANGE….

 व्हा धाडसी…. बदलासाठी… !!!

लेखक : अज्ञात

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आपण इतके तुसडेपणाने का वागतो ?” – लेखक : श्री दिलीप ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “आपण इतके तुसडेपणाने का वागतो ?” – लेखक : श्री दिलीप ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

हल्ली एक बदल अगदी ठळकपणे दिसून येतो. पूर्वी कुठल्याही सणा – समारंभाला माणसे जमली की एकमेकांना भेटत असत. गप्पा तर संपता संपत नसत. कार्यक्रमस्थळी म्हणजे घरामध्ये, मंडपामध्ये, कार्यालयामध्ये एखादे कुटुंब शिरले की त्याचे सहजपणे विभाजन होऊन पुरुष मंडळी पुरुष गटात, स्त्रिया त्यांच्या गटात तर लहान मुले इतर मुलांमध्ये झटकन मिसळून जात असत. पुरुष पानसुपारीच्या तबकाभोवती किंवा एखाद्याची चंची उघडून गप्पाष्टक सुरु होत.कुठलेही खेळणे उपलब्ध नसताना मुलांचा धुडगूस सुरु होत असे. तमाम स्त्रियांच्या वनितावृंदाचा खास एपिसोड सुरु होई. त्यावेळीही एकमेकांत मानापमान,हेवेदावे, रुसवेफुगवे,वितुष्ट,असूया, धुसफूस, अबोला असायचा,पण तो ठराविक मर्यादेपर्यंत. मुलांचे एकमेकांना चिडवणे, बोचकारणे असायचे. तरीदेखील यासर्व गोष्टींच्या अस्तित्वासह माणसं एकमेकांना भेटत होती, एकमेकांकडे जात होती, बोलत होती.हे सारे अगदी बळवंतराव, सदुकाका, दामुअण्णा, अनुसूयाकाकू, गंगामावशी, सिंधूआत्या, बंड्या, चिंगी, चंदू यांच्यापासून ते अगदी वसंतराव, विश्वासराव, मालती, उषा, मोहन, किशोर यांच्यापर्यंत व्यवस्थित चालू होतं !

आता मात्र बदल इतका झालाय की लोकांचा एकमेकांशी संवाद जवळजवळ बंदच झाला आहे. हल्ली घरांमध्ये होणारे छोटेखानी समारंभ बंद झाले आहेत. मध्यम कार्यक्रम किंवा मोठे कार्यक्रम हॉलमध्ये साजरे होतात. त्याला इतकी माणसं निमंत्रित असतात की यजमानाची तुमच्यावर एक नजर पडली तरी खूप झाले. मग जमलेली माणसं आपापला गट करूनच स्थानापन्न होतात मग लगेचच स्क्रीनमग्न होतात. समारंभ कसला आहे, कोण कोण आलंय, काय चाललंय यांच्याशी कसलाही संबंध नसल्यासारखी माणसं मोबाईलमध्ये व्यस्त होतात. हा ‘ शब्देवीण संवादु ‘ संपला की थोडंसं जुजबी बोलायचे… ‘ अरे आहेस कुठे हल्ली तू ? काय नवीन विशेष? US ला गेला होतास ना तू? ‘ ‘ काय ग किती बारीक झालीस, ड्रेस काय मस्त आहे, तुझी मुलगी काय क्यूट दिसते, मुलगा काय ICSE ला ना,’ ..  असले औपचारिक संवाद घडतात. तेवढ्यात कुणाचा तरी मोबाईल वाजतो आणि हा संवादसुद्धा थांबतो. कुणी आपणहून कुणाशी बोलतच नाही. प्रत्येकाला दुसऱ्याबद्दल असे वाटते की ” तो हल्ली स्वतःला खूप शहाणा समजतो ” ! बरं, हे सगळे बाजूला सारून जर एखादा आपणहून सर्वांकडे जाऊन बोलू लागला तर इतरांना वाटतं ” हा हल्ली ज्याच्या त्याच्या गळ्यात का पडतो कुणास ठाऊक “!…… हे सगळे अनुभवल्यावर असे वाटते की काय झालय आपल्याला ? का आपण हल्ली इतके तुसडेपणाने वागतो ?

मला त्याची कांही कारणे अशी वाटतात. माणसांचे एकमेकांवरील अवलंबित्व संपत चालले आहे. सक्तीची एकत्रित कुटुंब पद्धती, पैशांचे पाठबळ, मनुष्यबळ, रात्री अपरात्री लागू शकणारी मदत, सुरक्षितपणा, धंदेवाईक असलात तर व्यवसायबंधूंचा आधार, अशा अनेक गोष्टींमुळे पूर्वी माणसं एकमेकांशी जोडलेली राहत असत. आता एकत्र कुटुंब मोडून विभक्त कुटुंब झाली. माणसांचे उत्पन्न वाढले त्यामुळे खर्च करण्याची शक्ती वाढली. बँकांमधून मिळणारी कर्ज, एटीएम इत्यादींमुळे पैशाची आकस्मिक गरज भागते. पैसे टाकले की मनुष्यबळ उभे करता येते हा आत्मविश्वास. घरात आजारी माणसाला सांभाळणाऱ्या माणसापासून मंगल कार्यातील केटररच्या सेवेपर्यंत सर्व काही उभे करता येते. अपरात्री फोन करून रुग्णवाहिका येते तर मृत्युप्रसंगी सर्व काही सांभाळणाऱ्या व्हॅन मागवता येतात. ऑनलाईन खरेदी विक्रीमुळे तर दुकानात जायची देखील आवश्यकता राहिली नाही.

समाजाऐवजी गटसमूह तयार होतायत. त्यात राहूनही माणूस एकाकी पडतोय. मानसिक – भावनिक आधार तुटत चाललाय. अपयश, दु;ख, आजारपण अशा गोष्टींमुळे खचून संपूर्ण कुटुंबच जेव्हा आत्महत्त्या करते तेव्हा असे वाटते की काय झालय आपल्याला ? वरकरणी सर्वत्र भरभराट आणि ऐश्वर्य दिसत असतांना अति ताणामुळे मधुमेह, रक्तदाब, हृद्रोग वेगाने वाढतोय. माणसा – माणसांमधील सहज आणि नैसर्गिक संवादामुळे होणारे भावनांचे अभिसरण ( ventilation ) थांबलंय ! जुनी मुरलेली मैत्री विसरून मित्र आपापल्या मोठेपणाच्या कोषात जाऊन बसतात. लग्नप्रसंगी, शुभकार्यात पूर्वीची एकमेकांना मदत करण्याची पद्धत गेली. आता तर अगदी सख्खी भावंडंसुद्धा एकमेकांशी बोलत नाहीत….. मग पुन्हा माणूस ‘ एकला चालो रे ‘ कडे वळतो. तुडडेपणाचे एक नवीन आवर्तन सुरु होते !

कळतच नाही आपण असे का वागतो?

पहा … तुम्हाला काही उत्तर सुचतंय का ?

काही सुचले तर अवश्य शेअर करा. 

आपल्यातील माणुसकी एकदमच संपायच्या आत आपणच काही करू शकलो तर परत एकदा आनंदी समूह म्हणून रहायला लागू.

लेखक : श्री दिलीप

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ – एक सुंदर पंचाक्षरी कविता… – कवि – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ – एक सुंदर पंचाक्षरी कविता… – कवि – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

  पाय जपावा

   वळण्याआधी

   तोल जपावा 

   ढळण्याआधी !

  

 अन्न जपावे

   विटण्याआधी

   नाते जपावे

   तुटण्याआधी !

   

शब्द जपावा

   बोलण्याआधी

   अर्थ जपावा

   मांडण्याआधी !

   

रंग जपावे

   उडण्याआधी

   मन जपावे

   मोडण्याआधी !

  

 वार जपावा

   जखमेआधी

   अश्रू जपावे

   हसण्याआधी !

  

 श्वास जपावा

   पळण्याआधी

   वस्त्र जपावे

   मळण्याआधी !

   

द्रव्य जपावे

   सांडण्याआधी

   हात जपावे

   मागण्याआधी !

   

भेद जपावा

   खुलण्याआधी

   राग जपावा

   भांडणाआधी !

  

 मित्र जपावा

   रुसण्याआधी

   मैत्री जपावी 

   तुटण्याआधी !!!

कवी : अज्ञात

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मुलीची आई… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

? वाचताना वेचलेले ?

🍃 मुलीची आई… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)  

मुलीची आई असणं किती भाग्याचं!!

आई ग्ग.. चटका लागून जीव कळवळला..

इवलीशी पावलं स्टूल वर चढून बर्नोल घेऊन आली..

आई भाजलं ना तुला..

फुंकर घालत क्रीम लावली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

आई ,आई, थांब ती पिशवी दे माझ्याकडे..

तू पिल्लूला घेतलंय ना..

ओझं होईल तुला..

छोटासा का होईना पण भार हलका करून पळाली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

पिल्लू रडू नको ना..

आई येते आत्ता… अले अले..

गप बश..गप बश..

माझ्या माघारी ती आई झाली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

चप्पल नाही घातलीस आई तू?

राहू दे.. मी जाईन स्कूल बस पर्यंत..

वजनदार दप्तर इवल्या खांद्यांवर चढवून तुरुतुरु गेली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

‘बाबा, आई चा बर्थडे आहे उद्या..

तिला मायक्रोव्हेव हवा आहे..

बुक करून ठेव हां..

आणि साडी आन.. पिकॉक ग्रीन कलरची.. तिला हवी होती कधीची..’ 

आईची आवड तिला कळाली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

आई ग, लग्नाला जायचंय ना तुला, साड्या प्रेस करून ठेवते आणि उद्या बॅग भरून देते..

शाळेच्या अभ्यासातही आई ची लगबग तिला लक्षात आली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

मामी, आईला ना सतरंजी नाही चालणार, गादी लागते, नाहीतर पाठ धरते तिची..

लेक्चर्स प्रॅक्टिकल, सबमिशनच्या धामधुमीत

आईची गरज तिने ओळखली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

दादा, तू फराळाचं सामान न्यायला हवं होतं.. किती आनंदाने केलं होतं तिने..

तेवढ्याचं ओझं झालं तुला. पण आई किती हिरमुसली.

आईची माया तिला उमजली..

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

दुपारच्या निवांत क्षणी टीव्ही पाहताना अलगद डोळा लागला,

 ऑफिसच्या लंच ब्रेक मध्ये आलेली ती, मला पाहून पाय न वाजवता अंगावर पांघरूण घालून गेली,

शाल नव्हे, लेकीने मायची मायाच पांघरली,

कधी मोठी झाली कळलंच नाही..

 

लग्न, संसार, मूलबाळ, जबाबदाऱ्या, करिअर, सारं सारं सांभाळून ‘ गोळ्या घेतल्यास का, बरी आहेस का, डॉक्टरांकडे जाऊन आलीस का, दगदग करू नकोस, मी किराणा ऑर्डर केलाय..घरी येऊन जाईल, प्रवासाची दमलीयेस स्वयंपाक करू नको.. डबा पाठवतेय दोघांचाही, अजून काय काय अन् काय काय..

लेक होती ती माझी फक्त काही दिवस..त्यानंतर तिच्यात उमटली आईच माझी.. 

मीच नाही, आम्हा दोघांचीही आईच ती..

लोक म्हणतात, देव सोबत राहू शकत नाही म्हणून आई देतो,

आई तर देतोच हो, पण आईला जन्मभर माय मिळावी म्हणून आईची माया लावणारी लेक देतो..

मुलगा हा दिवा असतो वंशाचा पण मुलगी दिवा तर असतेच, सोबतच उन्हातली सावली, पावसातली छत्री, आणि थंडीत शाल असते आईची.. किंबहुना साऱ्या घराची…

हे शब्द तर नेहमीच वाचतो आपण, पण जाणीव तेव्हा होते जेव्हा आपलंच पिल्लू कोषातून बाहेर पडून पंख पसरू बघतं आपल्याला ऊब देण्यासाठी,

परी माझी इवलीशी खरंच कधी मोठी झाली कळलंच नाही……

सर्व आईना व लेकीना समर्पित

लेखक : अनामिक 

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देवाविषयीचे प्रश्न — लेखक – अज्ञात ☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ देवाविषयीचे प्रश्न — लेखक – अज्ञात ☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆

१) देव कुठे आहे?

२) देव काय पाहतो?

३) देव काय करतो?

४) देव केव्हा हसतो?

५) देव केव्हा रडतो?

६) देव काय देतो?

७) देव काय खातो?

१) देव कुठे आहे? – जसे दुधात तूप कुठे आहे? तर दुधात तूप सर्वत्र आहे. तसेच देव सर्वत्र आहे. सर्व देशात, सर्व काळात व सर्व वस्तूत आहे.

तो नसे ऐसा ठाव असे कवण | सर्वत्र संपूर्ण गगन जैसे ||

– नामदेव…

विठ्ठल जळी स्थळी भरला | रिता ठाव नाही उरला ||

– ज्ञानदेव…

२) देव काय पाहतो? – जसे दिवा कुठे पाहतो? तर सर्व ठिकाणी पाहतो. तसा देव सर्वांना पाहतो. त्याचे डोळे विशाल आहेत.

‘मनोजगर्वमोचनं विशाललोल लोचनं’ |

– श्रीशंकराचार्य…

त्याच्या दृष्टीतून काहीसुद्धा सुटू शकत नाही. ना खारुताईची सेवा ना मांडव्य ऋषींनी काजव्यास केलेली दुखापत. कोणी असं समजू नये मला कोणी पाहत नाही. तो सर्वांना आणि सर्वत्र पाहतो.

३) देव काय करतो? – भक्तांचा सांभाळ व दुष्टांचे निर्दालन.

घेऊनिया चक्र गदा | हाची धंदा करितो ||१||

भक्ताराखे पायापाशी | दुर्जनासी संहारी ||

– तुकाराम…

तुका म्हणे आले समर्थाच्या मना | तरी होय राणा रंक त्याचा ||

– तुकाराम…

४) देव केव्हा हसतो? – जीव जेव्हा जननीच्या उदरात असतो तेव्हा देवास सांगतो, “या संकटातून मला सोडव. मी तुझा अंश आहे.” जीव म्हणतो, “सोहं, तू आणि मी समान.” पण जीव जेव्हा संकटातून सुटतो, बाहेर येतो तेव्हा म्हणतो, कोहं (क्यां)! मी कोण आहे?” देव तेव्हा हसतो. आणि देवास फसविणाऱ्या जीवाच्या मागे अहं लावून देतो. अहंमुळे जीव दु:ख भोगतो.

५) देव केव्हा रडतो? – भक्ताची दीन दशा पाहून. जेव्हा सुदामदेव श्रीकृष्णास भेटण्यास आले. त्यांनी सुदामाची दशा पाहिली. फाटके कपडे, पायात चप्पल नाही, शरीर कृश झालेले. हे पाहून देवास अश्रू आवरता आले नाहीत. 

देव दयाळ दयाळ | करी तुकयाचा सांभाळ ||

– तुकाराम…

६) देव काय देतो? – देव सर्वांना सर्व देतो. देह देतो, इंद्रिय देतो, प्रेम, क्षमा शांती आणि शक्ति देतो.

देवे दिला देह भजना गोमटा | तया झाला फाटा बाधीकेचा ||

– तुकाराम…

दिली इंद्रिये हात पाय कान | डोळे मुख बोलाया वचन |

जेणे तू जोडसी नारायण | नाशे जीवपण भवरोग ||

– तुकाराम…

प्रेम देवाचे हे देणे | देहभाव जाय जेणे ||

– तुकाराम…

देव सर्वांना उचित तेच सर्व देतो. कारण हे सर्व देवाचेच आहे.

७) देव काय खातो? – देव प्रथम भक्ताचे दोष खातो.

माझ्या मीपणाचा करोनि फराळ | उरले खावयासी बैसला सकळ |

ऐसा भुकाळ हा नंदाचा गोवळ | यासी न पुरेची ग्रासीता माझा खेळ ||

– निळोबा…

यानंतर भक्ताचे चित्त हरण करतो व जन्म-मरणपण खाऊन टाकतो. हे सर्व केल्यानंतर भक्ताची बोरे अथवा कण्या खातो.

“सप्त द्विप नवखंड पृथ्वी भोजन किया अपार |

एक बार शबरीके घर, एक बार विदुरके घर स्वाद लिया दो बार ||”

भक्ताने सद्भावपूर्ण अर्पण केलेले पत्र, पुष्प, फळ, पाणी प्रार्थना अथवा साधा प्रेमाने केलेला नमस्कारसुद्धा  आनंदाने ग्रहण करतो… अगदी भृगू ॠषिंनी मारलेल्या लाथेच्या पदचिन्हालाही श्रीवत्स चिन्ह म्हणून छातीवर ग्रहण केले!

देवाबद्दल अनंत प्रश्न आणि शंका आपल्याला असतात पण त्याचं असणं मान्य नसतं. साक्षीभावाने तो सर्वांबरोबर सर्वकाळ असतोच फक्त त्याच्या कुठल्याही स्वरुपाचे श्रद्धेने भक्तिभावाने आणि विश्वासाने स्मरण केले की तो आपल्या जीवनात कार्यशील होतो.

॥श्रीगुरुदेवदत्त॥

जय जय श्री स्वामी समर्थ

संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ‘स्त्रियांच्या सुंदरछटा…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ ‘स्त्रियांच्या सुंदरछटा…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन 

डेअरी दुकानात श्रीखंडासाठी रांगेत उभा होतो.

तिथे एकाच ठिकाणी

” दूध, दही, ताक, लोणी, तूप”

बघून वाटलं की अरेच्या, ह्या तर सर्वच स्त्रीच्या जीवनाच्या अवस्था आहे..!

पाहूया कसे ते..?

“दूध”

दूध म्हणजे लग्नापूर्वीचं जीवन:.. कुमारिका .

दूध म्हणजे माहेर .

दूध म्हणजे आईवडिलांशी नातं .

शुभ्र,

सकस,

निर्भेळ,

स्वार्थाचं पाणी टाकून वाढवता येत नाही,ते लगेच बेचव होतं.

त्यावेळी तिला आपल्यासारखं जग सुद्धा स्वच्छ ,सुंदर,निरागस दिसतं.

“दही”

कन्यादानाचं विरजण लग्नात दुधाला लागलं की कुमारिकेची वधू  होते .

दुधाचं  नाव बदलून दही होतं !

दही म्हणजे त्याच अवस्थेत  थिजून घट्ट होणं !

लग्नाच्या दिवशी मुलीची झालेली बायको पुढे अनेक वर्षे त्याच भूमिकेत थिजून राहते.

दही म्हणजे मुलीचं आपल्या लग्नाशी असलेलं घट्ट नातं. ” कितीही मारहाण करणारा, व्यसनी, व्यभिचारी, मनोरुग्ण किंवा नुस्ता कुंकवाचा धनी असलेला नवरा असला तरी ” स्त्री त्याच्याप्रती  एवढी निष्ठा का दाखवते ?

नवरा हा “पती परमेश्वर” म्हणून ? नव्हे तर याचं उत्तर म्हणजे तिचं आपल्याच लग्नाशी असलेलं घट्ट नातं.

“ताक”

सर्वसामान्य स्त्रिया लग्नात दही झाल्या कि दुसऱ्या दिवसापासून संसाराच्या रवीने घुसळल्या जातात, त्यांची आता सून होते, म्हणजे “ताक” होतं.

“दूध जसं सकस तसं ताक बहुगुणी.”

‘बडबडणारी सासू असो ( वात प्रकृती) किंवा  खवळलेला नवरा असो  (पित्त प्रकृती)’

ताक दोघांनाही शांत करतं.. यांवर उत्तम उपाय असं आयुर्वेद म्हणतो.

“ताक” म्हणजे सुनेचं सासरशी नातं.सासरी स्त्री ताकासारखी  बहुगुणी असावी लागते. सगळ्या प्रश्नावर तीच उपाय. तिथे दूध पचत नाहीच !

‘दूध’ पाणी घालून बेचव होतं पण ‘ताक’ मात्र पाणी घालून वाढत राहतं आणि अनेक वर्ष  संसारातल्या सगळ्या प्रश्नावर  कामी येतं .

“लोणी”

अनेक वर्ष संसाराच्या रवीने घुसळून घेत ताक सर्वाना पुरुन उरतं. मग २० वर्षांनी जेव्हा माझं फलित काय असा प्रश्न ताक विचारतं  तेव्हा, मऊ .. रेशमी ..  मुलायम .. नितळ लोण्याचा गोळा नकळत वर आलेला दिसतो .

हे लोणी म्हणजे नवऱ्याशी नातं. रवीच्या प्रत्येक घुसळणीत ह्या नात्याचे कण  कण  ‘लोणी’ होऊन हळूच बाजूला जमा होत असतात हे तिच्या लक्षात येत नाही. कानावरच्या चंदेरी बटा खरं तर रोज आरशात  लाजून तिला सांगत असतात.पण तिला त्यांची ही भाषा कळत नाही.

तरुण दिसण्यासाठी ती त्याचं तोंड काळं करते.

‘ताकाला’ पुन्हा ‘दूध’ व्हायचं असतं, हा वेडेपणा नाही का ?

“तूप”

‘लोणी’ ही तिची अंतिम अवस्था नसते म्हणून ते फार काळ धरून ठेवता येत नाही.

ते आपलं रूप बदलतं . नव-याच्या नात्याचं प्रेम कढवून ती आता घरासाठी,

नातवांसाठी आज्जीचं नवं रूप घेते;त्याच लोण्याचं आता कढवलेलं “साजूक तूप होतं”

वरणभात असो

शिरा असो

किंवा

बेसन लाडू असो

घरातल्या प्रत्येक गोष्टीत आता आजी नावाचं पळीभर  साजूक तूप पडतं आणि जादू घडते.

देवासमोरच्या चांदीच्या छोट्या निरांजनात तुपाच्या लहानश्या गोळ्यात खोचलेली वात  बघितली की मला घरासाठी येताजाता हात जोडणारी चंदेरी केसांची आजी दिसते.

घरासाठी कुटुंबासाठी प्रार्थना करत करत हे ‘तूप’ संपून जातं. हीच ती स्त्रीची अंतिम उच्च अवस्था होय.

“दूध ते तूप”

हा असा अनोखा स्त्रीच्या आयुष्याचा प्रवास.

“स्री आहे तर श्री आहे हे म्हणणं वावगं ठरूं नये.”

“असा हा स्रीचा संपूर्ण प्रवास …. न थांबणारा, सतत धावणारा, न कावणारा, न घाबरणारा, कुटूंबासाठी झिजणारा, कुटूंबाची काळजी घेणारा”

… ह्या प्रवासास तथा ” स्त्री ” जातीस मानाचा मुजरा.ll.

लेखक : अज्ञात

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares