मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – २९– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – २९– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[१]

माझीच सावली

पसरतो मी माझ्या रस्त्यावर

कारणदिवा आहे माझ्याकडे

पण न पेटवलेला….

 

[२]

चवच सारी

हरवून बसलास

आणि आता

अन्नाला

दोष देतोस?

 

[३]

नम्रतेचा शिखर

गाठता आलं

तरच जवळ जाता येतं

शिखराच्या

 

[४]

समृद्ध अन यशस्वी लोक

फुशारकी मारतात जेव्हा

ईश्वरी कृपेची

तेव्हा

किती शरमून जातो ईश्वर

 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आदर्श ☆ सुश्री सुनीता पाटणकर

सौ. सुनीता पाटणकर

? वाचताना वेचलेले ?

☆ आदर्श ☆ सुश्री सुनीता पाटणकर ☆

एक जण भारतीय लोकशाहीला शिस्त लावणारा तडफदार माजी निवडणूक आयुक्त,  तर दुसरा कोकणरेल्वे, दिल्लीमेट्रो सारख्या चमत्काराचा निर्माता मेट्रो मॅन.– टी.एन.शेषन आणि ई.श्रीधरन— हे दोघंही आपआपल्या क्षेत्रात टॉपचे अधिकारी तर होतेच, पण दोघांनीही आपल्या कामामुळे अख्ख्या देशाची व्यवस्था सुधारून दाखवली.

विशेष म्हणजे हे दोघेही अधिकारी अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासून एका वर्गात होते, आणि पहिल्या नंबरसाठी त्यांच्यात तुफान स्पर्धा चालायची.

 ई.श्रीधरन यांनी एका मुलाखतीमध्ये त्याकाळातल्या आठवणी सांगितल्या आहेत—–

 दोघेही मूळचे केरळचे. १९४२ साली तिथल्या पलक्कड या गावातल्या सर्वात फेमस असलेल्या बेसल एव्हान्जीकल मिशन हायस्कूलमध्ये श्रीधरन यांनी इंग्रजी दुसरी या वर्गात प्रवेश केला. शेषन आधीपासून त्याच शाळेत होते. वर्गात त्यांचा पहिला नंबर यायचा.

 श्रीधरन यांनी आल्याआल्या त्या वर्षी शेषन यांना मागे टाकले. तिथून या दोघांची स्पर्धा सुरु झाली.  शेषन उंचीला कमी असल्यामुळे वर्गात पहिल्या बेंचवर बसायचे, तर श्रीधरन उंच असल्यामुळे शेवटच्या बेंचवर. शेषन हे अतिशय अभ्यासू, कायम पुस्तकात बुडालेले असायचे. याउलट श्रीधरन फुटबॉल खेळायचे. इंग्रजीमध्ये मात्र टी.एन.शेषन यांच्या तोडीस तोड अख्ख्या शाळेत कोणी नव्हतं.

 बोर्डाच्या परीक्षेत शेषन यांनी श्रीधरन यांना १ मार्काने मागे टाकलं. १९४७ सालच्या ssc बोर्ड परीक्षेत शेषन ४५२ मार्क मिळवून पहिले आले, तर श्रीधरन यांना ४५१ मार्क मिळाले होते व त्यांचा दुसरा क्रमांक आला होता.

 मार्कांसाठी किती जरी स्पर्धा असली, तरी शेषन आणि श्रीधरन  चांगले दोस्त होते.

पुढे इंटरमीजीएटसाठीदेखील व्हिक्टोरिया कॉलेजला दोघांनी एकत्र ऍडमिशन घेतलं. दोघांनी एकत्र झपाटून अभ्यास केला. अख्ख्या मद्रास प्रांतामध्ये इंजिनियरिंगला प्रवेश मिळेल एवढे मार्क मिळवणारे ते दोघेच होते.: पण टी.एन.शेषन यांना आपल्या भावाप्रमाणे आयएएस अधिकारी बनायचं होत.  यामुळे त्यांनी इंजिनियरिंगला प्रवेश घेतला नाही व मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये फिजिक्स विभागात प्रवेश घेतला. श्रीधरन यांनी मात्र आंध्रमधल्या काकीनाडाच्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये सिव्हील इंजिनियरिंग पूर्ण केलं.

पुढे १९५४ साली युपीएससी परीक्षा पास होऊन आयएएस बनण्याचं  स्वप्न शेषन यांनी पूर्ण केलं. याच काळात श्रीधरन हे इंडियन इंजिनियरिंग सर्व्हिसेस एक्झाम पास होऊन रेल्वेमध्ये भरती झाले. 

 योगायोग असा की दोघेही ट्रेनिंगच्या निमित्ताने इंडियन फोरेस्ट कॉलेज, डेहराडून, येथे एकत्र आले. ते २ महिने शेषन व श्रीधरन सोबत राहिले. त्यानंतर मात्र दोघांचे रस्ते कायमसाठी वेगळे झाले. शेषन यांनी प्रशासकीय कारकीर्दीत एकामागून एक यश मिळवत भारताचे मुख्य कॅबिनेट सचिव बनण्यापर्यंत मजल मारली. हे भारतातील सर्वोच्च पद. १९८९ साली रिटायर झाल्यावर त्यांना निवडणूक आयुक्तपदावर नेमण्यात आलं.

 भारतात निवडणूक काळात आचारसंहिता कडकपणे राबवण्यास शेषन यांनी घालून दिलेली शिस्त कारणीभूत ठरली. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना मॅगसेसे पुरस्कार देखील देण्यात आला. तर श्रीधरन यांनी कलकत्ता मेट्रो, कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रो, कोची मेट्रो, लखनौ मेट्रो असे अशक्यप्राय वाटणारे प्रोजेक्ट स्वतःच्या कर्तबगारीने व नेतृत्वाने पूर्ण केले. विक्रमी वेळेत, सर्वोत्कृष्ट इंजिनियरिंगचे स्कील दाखवत, श्रीधरन यांनी भारतीय रेल्वेचा कायापालट करण्यात महत्वाची जबाबदारी पार पाडली. त्यांना याबद्दल भारताचा सर्वोच्च ‘ पद्मविभूषण ‘ हा सन्मान देण्यात आला.

मैत्रीत अनेकदा लोक स्पर्धा करतात. स्पर्धा असावी तर शेषन-श्रीधरन यांच्या प्रमाणे चांगले  काम करण्याची. देशाला ‘ नंबर वन ‘ करण्यासाठी या दोन दोस्तांनी जे प्रयत्न केले, त्याचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा हे नक्की.

 

संग्राहिका : – सौ. सुनीता पाटणकर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भेट…डाॅ.शुभा साठे ☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले

सौ. अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ भेट…डाॅ.शुभा साठे ☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆

(स्वा सावरकर आणि CDS जनरल बिपीन रावत यांच्यातील काल्पनिक संवाद)

बिपीन – तात्या, तुम्ही इथे बसलाय होय…. कुठे कुठे शोधलं तुम्हाला ! गेले चोवीस तास मी तुम्हालाच शोधत फिरतोय सगळीकडे. तात्या… तात्या… मी तुमच्याशी बोलतोय… तुम्हाला भेटायला आलोय… मी बिपीन… भारतमातेचा सुपुत्र !… तात्या, खरं सांगतो, तुम्ही आखून दिलेल्या मार्गावरून चालतांना मला माझाच खूप अभिमान वाटत होता. तुमचे विचारशिल्प मनात घोळवत चिंतन, मनन केलं की आपोआप समस्येचा उलगडा होऊन मार्ग दिसायचा. तेव्हा प्रत्येकवेळेस मी मनाने तुमच्यासमोर नतमस्तक होत होतो. आज प्रत्यक्ष तुम्हाला भेटण्याचा योग्य आला. तात्या… तात्या…. ऐकताय नं तुम्ही? माझ्याकडे बघत का नाही? मी कुठे चुकलो का? चुकलो असेल तर माझा कान धरा… तुम्हालाच तो अधिकार आहे. पण, खरं सांगतो… मातेच्या रक्षणात मी कणभरही कधीच कसूर केली नाही आणि लेफ्ट जनरल लक्ष्मणसिह रावतांनी म्हणजे बाबांनी पण नाही. १९७८ मध्ये गोरखा रायफलच्या पाचव्या बटालीयनमध्ये रुजू झाल्यापासून माझं एकच स्वप्न होतं….

तात्या – मग ते स्वप्न पूर्ण होण्याच्या आधीच इथे का आलास? कुणी आमंत्रण दिलं होतं तुला इथे येण्याचं? इथे कुणी तुझी वाट पाहत होतं? की इथे कुणाला तुझी खूप गरज होती?

बिपीन – नाही तात्या, तसं नाही… पण…

तात्या – पण काय? अं …. पण काय??? जिथे कुणालाही आपली गरज नाही किंवा जिथे कुणी आपल्याला बोलावलं नाही, तिथे आपण जाऊ नये, इतकंही तुला कळत नाही? जिला तुझी खरी गरज आहे… आपली माता… तिला तू असं एकटं सोडून आलास? अरे, शास्त्रीजी, सुभाष, मी… आमचा गप्पांचा फड जमला की आम्ही तिघंही तुझ्याविषयी खूप अभिमानाने बोलायचो. परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक…. अशी पदके तुझ्या छातीवर विराजमान होताना पाहून आमच्याच अंगावर मूठ मूठ मास चढत होतं. जेव्हा भारतमातेचं रक्षाप्रमुखपद तू स्वीकारलस तेव्हा तर माझा आनंद गगनात मावेना… चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ !!…. वाटलं, आता मानसच्या काठावर पुन्हा मंत्रघोष होणार !!…

बिपीन – तात्या, याचं खरं श्रेय तुम्हालाच आहे. तुम्ही मार्ग दाखवला तसं तसं मी वागत गेलो. तुम्ही म्हंटल होतं न..” आपलं भूदल, वायुदल, नौदल सुसज्ज बनवा. लढाऊ विमानांनी, आकाशयानांनी नि जेट विमानांनी आकाश आच्छादित होऊ द्या…” आता तर सुपरसोनिक, हायपरसोनिक क्षेपणास्त्र आपल्या जवळ आहेत. पृथ्वी, अग्नी, धनुष या क्षेपणास्त्रांनी आपण सुसज्ज आहोत. ब्राह्मोसला पाहून तर चीनला घाम फुटलाय. आणि हो.. “शत्रूच्या भूमीत घुसून युद्ध चालविणे हा युद्ध जिंकण्याचा प्रभावी मार्ग आहे”… हे तुमचं वाक्य सतत मनात घोळत होतं. म्हणूनच तर उरी सर्जिकल स्ट्राईक करून तुमचे शब्द कृतीत उतरवले.

तात्या – शाब्बास माझ्या वाघा !…

बिपीन – तात्या, तुमच्या डोळ्यात पाणी?

तात्या – एक डोळा हसतोय, एक डोळा रडतोय…. १९६२ मध्ये आपल्या सैन्यदलाची जी स्थिती होती, ती आता नाही याचा आनंद आहे. पण, जेव्हा मातेला तुझी नितांत गरज आहे तेव्हा तू तिला सोडून इथे आलास याचे अतीव दुःख आहे. शौर्य आणि साहस या शब्दांना समानार्थी शब्द म्हणजे ‘बिपीन रावत’ हे समीकरण इतक्यातच मिटायला नको होतं. भारतीय सेनेला एक नवीन वैश्विक ताकद मिळवून देणारा तू…. ५/६ वर्षांपूर्वी पण तू माझ्या काळजाचा ठोका चुकवला होतास.. आठवतंय तुला?

बिपीन – हो तात्या, चांगलंच आठवतंय. तेव्हा नागालँडमध्ये माझं पोस्टिंग होतं.

तात्या – तेव्हा वरची पायरी चढताचढता थांबलास… मातेच्या प्रेमापोटी परत फिरलास.. मग आताही तसं का नाही केलं?

तात्या – तात्या, तुमच्यासारखी मृत्यूला थोपवून धरण्याची शक्ती माझ्यात नव्हती. मृत्युंजयी तुम्ही एकच ! मला तर बोलावणे आल्यावर काहीही कारण न देता निघावंच लागलं. अजून खूप काम करायचं होतं, योजना आखून तयार होत्या आणि सिंधू पण भारतात आणायचीच असा कृतनिश्चयही केला होता… पण, हरकत नाही… तुम्हाला भेटून, तुमच्याकडून अक्षय ऊर्जा घेऊन परत जातो आणि राहिलेलं कार्य पूर्ण करतो की नाही बघाच…! मी पण भारतमातेला शब्द देऊन आलोय..   भेटेन नऊ महिन्यांनी…..

लेखिका– @ डॉ शुभा साठे 

संग्राहक : – सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मार्गशीर्ष…. श्रीअनंत जोशी ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ मार्गशीर्ष…. श्री अनंत जोशी ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

श्री कृष्णाने भगवदगीतेत “मासानाम मार्गशीर्षम” असे संबोधून ,या नक्षत्राचे मोठेपण वर्णन केले आहे. संस्कृतमध्ये मृग म्हणजे हरीण व हरणाचे डोके(शीर्ष) म्हणजे मृगशीर्ष. या मृगशीर्षाजवळ या महिन्यात पौर्णिमेचा चंद्र असतो म्हणून या महिन्याचे नाव मार्गशीर्ष महिना. याच मृग नक्षत्रात जून मध्ये जेव्हा सूर्य असतो तेव्हा मान्सूनची सुरुवात होते (मृगाचा पाऊस). आकाशातील हे अतिशय सुंदर व ठळक नक्षत्र एकदा बघितले  की आपण कधीच विसरू शकत नाही (फोटो जोडला आहे), भारतीयांना यात हरणाचे ४ पाय ,त्याचे डोके आणि व्याधाने (sirius / hunter star) पोटात मारलेला बाण (सरळ रेषेतील 3 तारे)असा आकार दिसतो. तर ग्रीक लोकांच्या समजुतीप्रमाणे त्यांना या नक्षत्राचा आकार म्हणजे योद्धा(warrior) दिसतो. त्यांनी याला नाव दिले (The orion) प्रगत शास्त्रीय अभ्यासाप्रमाणे आपल्या आकाशगंगेत ताऱ्यांचे पट्टे(spiral) आहेत , यातील एक पट्टा म्हणजे Orion-Cygnus Arm . आपला सूर्य व  सूर्यमाला याच पट्ट्यात येतात. 

तर याच मृग नक्षत्राचा आधार घेऊन लोकमान्य टिळकांनी The Orion  हे इंग्रजीत पुस्तक लिहून,  मृग नक्षत्राच्या पुराणातील उल्लेखांवरून व  गणितीय पद्धतीने भारतीय संस्कृतीची प्राचीनता व कालखंड  सांगितला  आहे ( पुस्तकाचा मराठी अनुवाद “मृगशीर्ष”)

असे  हे सांस्कृतिक , ऐतिहासिक, पौराणिक  व भौगोलिक महत्व असलेले मृग किंवा मार्गशीर्ष  नक्षत्र.

सोबत मृग नक्षत्राचा फोटो जोडला आहे. पुन्हा भेटू अवकाशातील नवीन विषय घेऊन.—

लेखक – श्री अनंत जोशी, पुणे

9881093880

संग्राहक – अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी कसा आहे ? ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ मी कसा आहे ? ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

आपल्याच देशातल्या एका सुप्रसिद्ध उद्योगपतींची ही कहाणी आहे. एक दिवस हे उद्योगपती सकाळी तयार होऊन कामाला जाण्यासाठी निघाले होते. तेवढ्यात त्यांच्यासमोर घरमालक येऊन उभा राहिला. “आज कसं येणं झालं..?” उद्योगपतींनी त्या माणसाला विचारले. कामाच्या नादात ते विसरून गेले होते की, समोर त्यांचा घरमालक उभा आहे. घरमालक विनम्रपणे म्हणाला,” मी भाडं वसूल करायला आलो आहे. दर महिन्याला तुम्ही पाठवता. यावेळेला कामाच्या गडबडीत राहून गेलेलं दिसतं.”

उद्योगपती वरमले आणि म्हणाले, ” हे घ्या तुमचं घरभाडं. उशीर झाल्याबद्दल क्षमा करा.” एवढे बोलून उद्योगपतींनी खिशात हात घालून पैसे काढले व घरमालकाला दिले. घरमालक   उद्योगपतींना म्हणाला,” तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून भाड्याच्या घरात राहता, याचे मला आश्चर्य वाटते.” यावर उद्योगपती हसले व म्हणाले, ” मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे याला महत्त्व आहे. माझ्या काही तत्त्वांमुळे मी भाड्याच्या घरात राहतो.” घरमालक काही समजला नाही. तो भाडे घेऊन निघून गेला.

प्रसंग त्या उद्योगपतींचा ड्रायव्हर पाहत होता. उद्योगपती गाडीत बसले व आपल्या परदेश प्रवासासाठी तिकीट काढायला एका एअरलाईनच्या ऑफिसात गेले. तिथे बरीच गर्दी होती. उद्योगपती एखाद्या सामान्य माणसासारखे रांगेमध्ये उभे राहिले.. तेवढयात एअरलाईनच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिले, ते घाईने पुढे आले आणि म्हणाले,” सर, तुम्ही रांगेत का उभे आहात..? आम्ही तुमचे तिकीट काढून तुम्हाला आणून देतो. तुम्ही समोरच्या सोफ्यावर आरामात बसा. तुम्ही रांगेत उभे राहून आम्हाला लाजवू नका.”

उद्योगपती म्हणाले, ” आत्ता मी उद्योगपती म्हणून इथे उभा नाही, तुम्ही एवढी धावपळ करण्याची आवश्यकता नाही. ‘ उद्योगपती ‘ हे माझ्या नावासमोर लावलेले विशेषण आहे. मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे? हे अधिक महत्त्वाचे आहे. ”  एअरलाईनचा स्टाफ हे उत्तर ऐकून चकित झाला. 

तिकीट काढून उद्योगपती आपल्या ऑफिसकडे निघाले. रस्त्यात त्यांना अनेक माणसे धावतपळत आपापल्या कार्यालयाकडे जाताना दिसली. त्यांना लाज वाटली की, आपण एवढ्या आलिशान गाडीमधून एकटे प्रवास करीत आहोत. सामान्य माणसे मात्र किती कष्टाने ऑफिसला पोहोचतात. त्या दिवसापासून त्यांनी आपल्या गाडीत लोकांना लिफ्ट द्यायला सुरुवात केली. लिफ्ट मिळालेल्या लोकांचा आनंद पाहून उद्योगपतींना समाधान वाटायचे.

एके दिवशी हे उद्योगपती परदेश प्रवासासाठी निघाले होते. त्या दिवशी एक प्रसंग घडला. हवाई सुंदरीच्या हातून त्यांच्या अंगावर चुकून पेय पडले. त्यामुळे ती घाबरली. तिने पाणी व कपडा आणून त्यांचा ड्रेस स्वच्छ केला. ती त्यांना ओळखत असल्याने तिने शतदा त्यांची क्षमा मागितली. तिला भीती वाटत होती की, या चुकीबद्दल तिला शिक्षा घडणार.. उद्योगपतींनी तिच्याकडे पाहिले व तिला विचारले, ” तू माझ्या अंगावर काय सांडलेस ?”  हवाई सुंदरी भीत भीत म्हणाली, “माझ्या हातून तुमच्या कपड्यांवर फळांचा रस सांडला, मला क्षमा करा.” उद्योगपती हसले व म्हणाले, ” पुढच्या वेळेला माझ्या अंगावर सोडा, व्हिस्की सांड “. उद्योगपतींचे बोलणे ऐकून हवाई सुंदरी खुदुकन हसली. तिच्या मनावरचा सगळा ताण एका क्षणात उतरला.

असे अनेक प्रसंग उद्योगपतींच्या ड्रायव्हरने पाहिले होते. त्याची उत्सुकता चाळवली गेली. तो उद्योगपतींना म्हणाला, ” साहेब, तुम्हाला इतके साधे राहणे व वागणे कसे काय जमते..? आम्ही तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतो. तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून तुम्ही किती साधे जगता ??”

उद्योगपती म्हणाले, ” अरे, मी लहान असताना फार उद्दाम होतो. मला सांभाळायला एक दाई होती. एकदा माझ्या मनाविरुद्ध काही घटना घडली तेव्हा मी तिला चक्क लाथ मारली होती. ते पाहून माझे वडील एवढे संतापले होते की, त्यांनी मला बदडून काढले. ते मला म्हणाले होते, ” तू कोण आहेस हे बिलकूल महत्त्वाचे नाही; पण.. ‘ तू कसा आहेस ‘ हे फार महत्त्वाचे आहे. आयुष्यभर माझे हे वाक्य स्मरत राहा .”—–

—” तेव्हापासून मी वडिलांचे शब्द स्मरत आलो आहे. मला हे पटले आहे की, ‘ खरोखरच आपण कोण आहोत ‘ हे महत्त्वाचे नसतेच. ‘आपण कसे आहोत ‘ यावर आपली किंमत ठरते. जगात जेवढे थोर पुरुष होऊन गेले, सगळे साधेच होते.”

या उत्तुंग उद्योगपतीचे नाव—रतन टाटा…

खरंच, जगात जेवढी उत्तुंग माणसे होऊन गेली ती सगळी बोलायला, वागायला अत्यंत साधी—कुठलीही गुंतागुंत नसलेली— अशीच होती. .

खरेतर—-साधे राहणे हेच कठीण असते. अशा  व्यक्तींच्या जीवनाचे आपण अनुकरण करायला हवे…

म्हणूनच, ” तुम्ही कोण आहात . ”  हे महत्वाचे नाही—- ” तुम्ही कसे आहात ”  हे महत्वाचे आहे—-

विचार जरूर करा—

 

संग्राहक :- श्री सुनीत मुळे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गोष्ट बाराची ☆ संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ गोष्ट बाराची… ☆ संग्राहिका – सुश्री मीनल केळकर ☆ 

ऐका गोष्ट बाराची—–

12/12/12/12/12

बारा हा जुन्या लोकांचा प्रिय अंक—-

मोजण्यासाठी द्वादशमान पध्दती—१२ची

फूट म्हणजे १२ इंच

एक डझन म्हणजे १२ नग.

वर्षाचे महिने १२,

नवग्रहांच्या राशी १२

गुरू,शनी, मंगळ हानिकारक समजले जातात….१२ वे

तप….१२ वर्षाचे,

गुरुगृही अध्ययन….१२ वर्षे

घड्याळात आकडे…..१२,

दिवसाचे तास …..१२,

रात्रीचे तास …..१२ ,

मध्यरात्र म्हणजे रात्रीचे..१२

मध्यान्ह म्हणजे दुपारचे..१२

एकादी गोष्ट तुटली फुटली म्हणजे तिचे वाजले….१२

सकाळच्या बाजारात उरला सुरला माल– १२ च्या भावात 

पूर्वी मुलीचा विवाह १२ व्या वर्षी करत..

इंग्लंडमध्ये १२ पेन्सचा १ शिलिंग

बाळाचे नामकरण– १२ व्या दिवशी 

मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही १२ दिवसांचे..

ज्योतिर्लिंग…..१२ आहेत,

कृष्ण जन्म….रात्री १२

राम जन्म दुपारी…१२ ,

मराठी भाषेत स्वर…१२– त्याला म्हणतात…बाराखडी

१२ गावचा मुखीया,

जमिनीचा उतारा ७/१२चा

इंजिनिअरींग, मेडीकल, किंवा इतर कोर्सेससाठी प्रवेश – १२ वी नंतर 

खायापिया कुछ नही , गिलास फोडा–बाराना

बारडोलीचा सत्याग्रह 

पळून गेला ——पो’बारा’

पुन्हा पुन्हा ——-दो’बारा’

एक गाव— १२ भानगडी

लग्न वऱ्हाडी —- ‘बारा’ती

बलुतेदार,बारभाई,बारावाटा…सगळे १२,

बेरकी माणूस म्हणजे –१२ गावचं पाणी प्यायलेला

तसेच कोणाचेही न ऐकणाऱ्या  रगेल व रंगेल व्यक्तीला १२ चा आहे असे म्हणतात.

काही लोकांच्या तोंडावर नेहमीच वाजलेले असतात ते पण– 12 

अशी आहे ही १२ चीं किमया….

कोणालाच दोष देऊन  उपयोग नाही…

महिनाच  “बाराचा” आहे—–

 

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फक्त प्रेम करा! ☆ सुश्री सुनीता पाटणकर

सौ. सुनीता पाटणकर

? वाचताना वेचलेले ?

☆ फक्त प्रेम करा! ☆ सुश्री सुनीता पाटणकर ☆

सख्खा भाऊ, सख्खी बहीण, सख्खी मैत्रीण, सख्खे काका, सख्खी काकू, सख्खी मावशी 

नेमकं काय असतं हे “सख्ख प्रकरण?” —–

 

सख्खा म्हणजे आपला सखा.

सखा म्हणजे जवळचा——जवळचा म्हणजे ज्याला आपण कधीही, केव्हाही, काहीही सांगू शकतो. 

त्याला आपलं म्हणावं,— त्याला सख्ख म्हणावं !

 

सध्याच्या कलियुगात, आपण काय करतोय हे सख्ख्या नातेवाईकांच्या कानावर पण पडता कामा नये इतकी खबरदारी घेतली जाते, तिथे सख्ख्य  नसते पथ्य असते.

 

ज्याच्या जवळ आपण मनातलं सारं काही सांगू शकतो, मोठ्ठ्याने हसू शकतो किंवा  काळजातलं दुःख सांगून स्फुंदून स्फुंदून रडूही शकतो त्याला सख्ख म्हणावं, त्याला आपलं म्हणावं !

 

ज्याच्याकडे गेल्यानंतर आपलं स्वागत होणारच असतं 

आपल्याला पाहून त्याला हसू येणारच असतं

अपमानाची तर गोष्टच नसते— फोन करून का आला नाहीस अशी तक्रारही नसते !

 

पंढरपूरला गेल्यावर विठ्ठल म्हणतो का —-

“ या या फार बरं झालं !” 

 

माहूरवरून रेणुका मातेचा, किंवा कोल्हापूरवरून महालक्ष्मीचा, किंवा तिरुपतीहून गिरी बालाजीचा आपल्याला काही Whatsapp call आलेला असतो का ?’ या ‘ म्हणून !

मग आपण का जातो ?— कारण भक्ती असते, शक्ती मिळते आणि संकटमुक्तीची आशा वाटते —-म्हणून ! – हा ही एक प्रकारचा ” आपलेपणाच !”

 

लौकिक अर्थाने, वस्तूच्या स्वरूपात देव आपल्याला कुठे काय देतो ? 

किंवा आपण नेलेले तो काय घेतो ? —काहीच नाही.

 

रुक्मिणी काय पाठीवरून हात फिरवून म्हणते का, 

“ किती जाड  झालीस ?  कशी आहेस ? सुकलेला दिसतोस, काय झालं ? “ 

—-नाही म्हणत.

मग दर्शन घेऊन निघतांना वाईट का वाटतं ?– पुन्हा एकदा मागे वळून का पहावं वाटतं ?

प्रेम, माया, आपुलकी, विश्वास, म्हणजेच ” आपलेपणा !”

 

हा आपलेपणा काय असतो ?—–

आपलेपणा म्हणजे भेटण्याची ओढ— भेटल्यानंतर बोलण्याची ओढ –-

बोलल्यानंतर ऐकण्याची ओढ—- आणि निरोप घेण्याआधीच— 

पुन्हा भेटण्याची ओढ !

 

ज्याला न बोलताही आपलं दुःख कळतं,  त्याला आपलं म्हणावं– 

आणि चुलत, मावस असलं, तरी सख्ख म्हणावं !

 

मी त्याचा आहे आणि तो माझा आहे ही भावना दोघांच्याही मनात सारखीच असणे …..

म्हणजे  ” आपलेपणा ! “

 

एक शब्दही न बोलता ज्याला पाहिल्या पाहिल्या डोळे भरून येतात,  आणि निःसंकोचपणे गालावरून ओघळू लागतात— 

तो आपला असतो —  ” तो सख्खा असतो !”

 

लक्षात ठेवा,

 

ज्याला दुसऱ्यासाठी “सख्ख” होता येतं, त्यालाच कुणीतरी सख्ख असतं. 

बाकी फक्त परिचितांची यादी असते —-

नको असलेल्या माणसांची गर्दी असते !—-

 

तुम्हीच सांगा—–

फक्त आईची कूस एक आहे म्हणून सख्ख म्हणायचं का ?—-

ज्याला तुमच्या दुःखाची जाणीवच नाही त्याला सख्ख म्हणायचं का ?—- 

 

आता एक काम करा —–

करा यादी तुम्हाला असणाऱ्या सख्ख्या नातेवाईकांची—- 

झालं नं मनात धस्स—- 

व्हायला लागली ना छातीत धडधड —-

नको वाटतंय न यादी करायला —-

रडू नका, पुसून टाका डोळ्यातलं पाणी— 

आणि मानायला लागा सर्वांना आपलं—- कोणी कितीही झिडकारलं तरी— 

कारण —–

राग राग आणि तिरस्कार करून काहीच हाती लागत नाही —-

जग फक्त प्रेमानेच जिंकता येतं —–

 

म्हणून फक्त प्रेम करा !!  फक्त प्रेम करा !!.

 

संग्राहिका : – सौ. सुनीता पाटणकर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रिय “ प “ — ☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले

सौ. अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

प्रिय “ प “ — ☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆

“प” माणसाला खूप प्रिय आहे,आपण जीवनभर या “प” मागे धावत असतो

जे मिळते तेही या “प” पासून आणि जे मिळत नाही तेही या “प” पासून

              प    पति

              प    पत्नि

              प    पुत्र

              प    पुत्री

              प    परिवार

              प  प्रेम

              प   पैसा

              प   पद 

              प प्रतिष्ठा

              प प्रशंसा

              प प्यार

              प पार्टी

              प परीक्षा

              प पब्लिसिटी

           

ह्या “प” मागे लागून लागूनच आपण “प” पासून पाप करत राहतो

आणि मग आपले “प” पासून पतन होते…

आणि शेवटी शिल्लक राहते फक्त  “प” पासून पश्चात्ताप…

पापाच्या  “प” मागे लागण्यापेक्षा सर्वात चांगले आपण  “प” पासून परमेश्वर च्या मागे लागावे आणि  “प” पासून पुण्य कमवावे 

शेवटी  “प” पासून प्रणाम—–

संग्राहक : – सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ विसर्जन…सुभाष अवचट ☆ संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ विसर्जन…सुभाष अवचट ☆ संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

कुठे, केव्हा, कसे थांबावे ही एक कला आहे. ती सर्व कलांमध्ये लागू होते. कविता, कथा, कादंबरी, चित्र, शिल्पात, कुठे थांबायचे याला संयम आणि विवेक लागतो. अन्यथा आशय भरकटत जातो. तसे जीवनातही घडते. माझ्याभोवती तरुणपणी अलौकिक माणसे होती. त्यांच्यामुळेच ही जाणीव मला होत गेली. विंदा करंदीकर माझे शेजारी आणि प्रतिभावंत कवी. एकदा त्यांनी ठणकावले की, आता मी लिखाण बंद करतो आहे. आणि त्यांनी शब्द पाळला. स्वत:शी प्रामाणिक राहून या निर्णयापर्यंत यावयास धारिष्टय़ तर लागतेच; पण विसर्जनाची बूजही लागते. तसेच तात्या माडगूळकरही होते. तेही माझे मित्र होते. आयुष्याच्या उताराला लागले तेव्हा या उमद्या लेखक, चित्रकार, शिकारी आणि प्रवासी माणसाने हाच मार्ग अवलंबला. ते म्हणायचे, ‘‘गडय़ा, जगण्याची आतून उमेद राहिली नाही.’’ विंदा शेवटपर्यंत प्रसन्न राहिले. भाजी, मासे आणायला आम्ही सोबतीने जात असू. मासेवाल्या बाईशी घासाघीस करायला त्यांना मजा येत असे. तेव्हा त्यांच्यातला कवी बहुदा त्यांच्या पिशवीत त्यांनी लपवून ठेवलेला असे. तितक्याच आत्मीयतेने ते संगीतात रमत. तसेच तात्या होते. संध्याकाळी आम्ही गप्पा मारीत फेरफटका मारीत असू. तेव्हा त्यांच्यातल्या अद्भुत लेखकाची सावली कुठेही त्यांच्याबरोबर चालत नसे. उरलेले जीवन एखाद्या कवितेसारखे गुणगुणत ही माणसे कुठलेही आविर्भाव न घेता जगले. पु. ल. देशपांडय़ांनीही वेळेनुसार आवराआवर केली. देणग्या देऊन, पुस्तके/ पुस्तकांचे हक्क त्यांनी वाटून टाकून ते मुक्त झाले आणि उरलेले आयुष्य एक गिफ्ट मिळाल्यासारखे हसत जगले.

‘‘जोपर्यंत लोकांना वाटते आपण अजून खेळावे, तीच थांबण्याची योग्य वेळ असते..’’ हे सुनील गावस्करचे वाक्य तंतोतंत यात बसते. कोठे थांबावे हाच संयम त्यात आहे.

विद्वान तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणजे आमचे आबा. त्यांचा व्यासंग, प्रभुत्व, त्यांची जाण, अभ्यास, समाज सुधारण्यासाठीचे त्यांचे दीर्घ कार्य सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांच्या सहवासात मला हेच जाणवते. या प्रचंड ज्ञानाच्या ग्रंथसंग्रहालयातून ते अचानक जुन्या महाबळेश्वरच्या घरी गेले. ड्रायव्हरला सांगितले, ‘‘सकाळी काही घाई नाही.’’ ड्रायव्हर जेव्हा आत आला तेव्हा छातीवर हात ठेवून आबांचे विसर्जन झाले होते. ज्ञानी आणि भक्कम जीवनाचा अर्थ कळलेले हे ऋषीच म्हणावे लागतील. साहित्य सहवासात संध्याकाळी फिरताना गंगाधर गाडगीळ एकदा भेटले. गाडगीळ हे ब्रिटिश शिस्तीतले होते. सगळं नीटनेटके, वेळेवर असायचे- जसे त्यांचे वाङ्मय आणि आयुष्य होते. त्या संध्याकाळी त्यांचा ड्रेसदेखील इस्त्री केलेला, तंतोतंत होता. त्यांच्या मदतीला बरोबर नोकरही होता. मला त्यांनी थांबवले आणि म्हणाले, ‘‘मिस्टर अवचट, बरे झाले आत्ताच भेट झाली ! आता पुढे भेट शक्य नाही.’’

‘‘परदेशी चाललाय का?’’ मी विचारले.

‘‘नाही. आत्ता सारे थांबवले आहे. लिखाण आणि इतर गोष्टी व्यवस्थित आवरल्या आहेत. औषधे बंद केली आहेत. आता एकेक मित्रांना भेटतो आहे. थँक्यू, तुमचा सहवास लाभला.’’ ते शांतपणे नोकराबरोबर फाटकापाशी चालत गेले. त्याच आठवडय़ात ते गेल्याचा निरोप आला. या लोकांनी हे विसर्जन किती समजूतदार आणि अलिप्तपणे स्वीकारले होते.

ओशोंनीही अत्यंत वेगळ्या संदर्भाने विसर्जनावर लिहिले आहे. Abandoning  करणे, सोडून देणे अशी सारी अंगे या विसर्जनात येतात. ओशोंनी शेवटी सांगितले, ‘‘ माझ्या गळ्यात घातलेल्या माळा फेकून द्या. संन्याशी भगवे कपडे काढून टाका. स्वत:चा संन्यास स्वत: शोधा. जे मौनात विसर्जित होते तेच चांगले संगीत !’’ त्यांच्या या वाक्यातच जीवनाच्या संगीताचे अर्थ सामावले आहेत. जगण्याच्या या शर्यतीत प्रत्येक जण निराळे मार्ग शोधतो. बहुतेकांना ते आयते हवे असतात. कोणाच्या तरी खांद्याची, दैवताची डोके ठेवण्याची त्यांची गरज असते. पण विसर्जन हा तुमच्या बौद्धिक पातळीचा, मनाचा एक भाग आतल्या आत असतो; जो भाग एखादा गुरू, प्रसाद म्हणून तुमच्या हातात देत नाही.

वयाप्रमाणे जीवनाशी सामील होणे यातच खरी ग्रेस आहे. अंगणात उन्हात तांदूळ निवडत बसलेल्या, साईसारखी त्वचा झालेल्या प्रेमळ आजीमध्ये ती ग्रेस असते.

कोऱ्या हॅण्डमेड पेपरवर रंगाचा पहिला ठिपका टाकल्यावर तो हळुवार पसरत जातो. पुन्हा अनेक रंगांत तो मिसळत जातो. त्याच्या कंट्रोल्ड ओघळांनी किंवा छटांनी एक चित्र बनते. कधी ते देखणे दिसते, कधी जमत नाही. हे महत्त्वाचे नाही. ती प्रोसेसच दैवी असते. त्या कागदावरच्या रंगाच्या प्रत्येक ठिपक्यात पारदर्शक विसर्जनाचे क्षण तरंगत असतात.. बदलत राहतात. विघटन हे अलौकिक अ‍ॅबस्ट्रॅक्ट नॅचरल चराचरातील मौनच असते.

‘समतया वसुवृष्टि विसर्जनै:’—–

जंगलात, ऋतुचक्रात हे सामावलेले असते. हत्तीला कळते आपले दिवस संपायला आलेत. कळपातून तो अपरात्री गुपचूप पाय न वाजवता निघतो आणि पूर्वीच शोधलेल्या गुप्त ठिकाणाकडे तो चालत राहतो. तो तेथे पोहोचतो आणि स्थिर उभा राहतो. त्याचा एवढा प्रचंड बलवान देह हळूहळू काही दिवसांत संपतो आणि मातीशी एकरूप होतो.. हे विसर्जन !

झाडाचे पिकले पिवळे पान फांदीवरून निसटते. हवेत तरंगत मौनाच्या प्रार्थनेसारखे जमिनीवर अलगद टेकते आणि विसर्जित होते. अगदी हळुवारपणे. विसर्जन ही मौलिक गिफ्ट आहे.

लेखक : – सुभाष अवचट 

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆  विमोह त्यागून कर्मफलाचा… – कवी मनोहर कवीश्वर ☆ संग्राहक – सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ अविमोह त्यागून कर्मफलाचा… – कवी मनोहर कवीश्वर  ⭐ संग्राहक – सौ.शशी.नाडकर्णी-नाईक ⭐

  सुधीर फडके यांनी गायलेले खालील अजरामर गीत म्हणजे भगवद्गीतेचा परिपाकच !

    — कवी मनोहर कवीश्वर यांनी लिहिलेल्या आणि बाबूजींनी गायलेल्या एका गाण्यात जणू गीतेचे सार एकवटून आले आहे. गीता जयंतीनिमित्त त्या गाण्याची उजळणी करूया

युद्धभूमीवर अर्जुनाची जी अवस्था झाली, ती अवस्था तुमची, आमची, सर्वांची रोजच होत असते. आपले म्हणवणारे लोक आपल्या विरुद्ध जाऊन बंड पुकारतात, तेव्हा आपले जीवन कुरुक्षेत्राप्रमाणे भासू लागते. मात्र, आपली एवढी पुण्याई नाही, की भगवान श्रीकृष्ण आपले मनोबल वाढवण्यासाठी आपल्या समोर प्रगट होतील. यासाठीच भगवंतांनी अर्जुनासकट सर्व मानवजातीला उद्देशून जे तत्त्वज्ञान सांगितले, ते म्हणजेच भगवद्गीता. भगवंतांनी गीता गायली, तो दिवस गीता जयंती म्हणून ओळखला जाऊ लागला. यापूर्वी आपल्याकडून गीतेचे पठण, चिंतन झाले नसेल, तर गीता जयंतीच्या मुहूर्तावर हे गीता पठणास सुरुवात करावी. 

आपल्या आयुष्यातील सर्व प्रश्नांची तात्विक उत्तरे गीतेत सापडतात. फक्त ती डोळसपणे शोधता आली पाहिजेत. समजवून घेता आली पाहिजेत . प्रत्यक्ष गीता समजली नाही, तर गीतेतील अनुवाद वाचावा, भावार्थ वाचावा. येनकेनप्रकारेण भगवद्गीतेतील बोध आपल्या आयुष्यात अंगीकारण्याचा प्रयत्न करावा. असाच एक प्रयत्न कवी मनोहर कवीश्वर यांनी एका गाण्यात केला आहे. त्या गाण्यात, जणू काही गीतेचे सार एकवटून आले आहे. गीता जयंतीनिमित्त त्या गाण्याची उजळणी करूया.

विमोह त्यागून कर्मफलांचा, सिद्ध होई पार्था,

कर्तव्याने घडतो माणूस, जाणून पुरुषार्था।

भगवान श्रीकृष्ण पार्थाची अर्थात अर्जुनाची समजूत घालतात, नात्यांचा मोह त्यागून ज्या कार्यार्थ युद्धभूमीवर आला आहेस, ते कार्य अर्थात धर्मयुद्ध करण्यासाठी सज्ज हो. या कर्तव्यापासून दूर पळू नकोस. ज्यांना आपले म्हणवतोस, त्यांनीही तुला आपले समजले असते, तर ते आज तुझ्याविरूद्ध युद्धासाठी सरसावले नसते. तू ही तुझे कर्तव्य ओळख आणि शस्त्र हाती घे.

शस्त्रत्याग तव शत्रूपुढती नच शोभे तुजला,

कातर होसी समरी मग तू, विरोत्तम कसला,

घे शस्त्राते सुधीर होऊन, रक्षाया धर्मार्था।

तू क्षत्रिय आहेस. युद्धभूमीवर पाठ फिरवून जाणे तुला शोभणार नाही. युद्धाच्या क्षणी तू भयभीत झालास, तर तुला कोणीही विरोत्तम म्हणणार नाही. हे युद्ध तुझ्या एकट्याचे नाही, तर धर्मरक्षणार्थ आहे. तुला धीर एकवटून आलेल्या प्रसंगाला तोंड दिलेच पाहिजे.

कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहांच्या फुलबागा,

मोही फसता मुकशिल वीरा मुक्तीच्या मार्गा,

इहपरलोकी अशांतीने तव विक्रम झुकविल माथा।

जेव्हा कर्तव्याची वेळ येते, तेव्हा कर्तव्यापासून परावृत्त करणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या आड येत राहतात. त्या मोहाच्या क्षणांना बळी न पडता आपण आपले काम चोख बजावायचे असते. तसे झाले नाही, तर तू भरकटत जाशील. ध्येयापासून परावृत्त झाल्यावर तुझ्या जगण्याला अर्थ उरणार नाही आणि ती सल आयुष्यभर तुला जगू देणार नाही.

कुणी आप्त ना कुणी सखा ना,जगती जिवांचा,

क्षणभंगूर ही संसृती आहे, खेळ ईश्वराचा,

भाग्य चालते कर्मपदांनी, जाण खऱ्या वेदार्था।

आपले आपले म्हणवणारे लोकच आपल्या पाठीत खंजीर खुपसतात. स्वत:च्या सावलीवरही विश्वास ठेवू नका. तीदेखील अंधारात आपली साथ सोडून जाते, मग इतरांकडून काय अपेक्षा ठेवणार? जोवर सगळे छान, सुरळीत सुरू आहे, तोवरच ही नाती आहेत, कठीण काळ येता, कोणीही कोणाला विचारत नाही. हा कठीण काळ नात्यांचा खरा परिचय करून देतो. म्हणून त्यांच्यावर विसंबून न राहता, तू तुझे कर्म प्रामाणिकपणे करत राहा आणि तुझ्या हातांनी तुझे आयुष्य घडव.

रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो,

कौरवात मी, पांडवात मी, अणुरेणुत भरलो,

मीच घडवितो, मीच मोडितो, उमज आता परमार्था।

चांगले-वाईट प्रसंग हाताळण्यासाठी तू समर्थ आहेस. दुसरे कोणी किंवा साक्षात परमेश्वर माझ्या मदतीला येईल याची वाट बघत बसू नकोस. मला शोधण्यात वेळ दवडू नकोस. मी अणुरेणुत सामावलो आहे. तुुझे कर्म योग्य असेल, तर मी कायम तुझ्या सोबत असेन. यशाने हुरळून जाऊ नकोस किंवा अपयशाने खचून जाऊ नकोस. ही सर्व माया मीच निर्माण केली आहे. त्यात न अडकता, तुला कर्तव्यनिष्ठ राहायचे आहे, हे लक्षात ठेव.

कर्मफलाते अर्पुन मजलासोड अहंता वृथा,

सर्व धर्म परि त्यज्युन येई शरण मला भारता,

कर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्मार्था।

*तुझे प्रत्येक कर्म भगवंताला साक्षी ठेवून कर. फळ काय मिळेल, याचा विचार न करता, तुझे कर्म करत राहा. केलेल्या कर्माचा वृथा अभिमान बाळगू नकोस. तू एक माध्यम आहेस. कर्ता करविता परमेश्वर आहे, हे कायम लक्षात ठेव, म्हणजे तुला अहंकाराची बाधा होणार नाही आणि अहंकाराचा वारा लागला नाही, तरच तू तुझ्या कर्तव्याबाबत जागरूक राहशील.

 

कवी: – मनोहर कवीश्वर

प्रस्तुती :-:ज्योत्स्ना गाडगीळ

संग्राहिका :– सौ शशी नाडकर्णी नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print