मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ती आणि लाॅकडाऊन… ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ती आणि लाॅकडाऊन… ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

कोरोना आला, आणि स्वयंपाकघर हे केवढं कला दालन आहे हे कळलं. 

 एवढ्याशा ओट्याच्या मंचावर किती मैफिली रंगतात. कढया,पातेल्या,झारे,पळ्या,शेगडी,तेल,डाळी,पीठं मुके नाहीत. ते बोलतात ,पण त्याची रूचिर भाषा आपण इतके वर्ष ऐकली नाही. कारण त्या रंगदेवतेकडे, स्त्रीकडे आपण दुर्लक्ष केलं. राजाचा मुकूट प्रधान घालत नाही आणि प्रधानाचा मुकूट राजा ! तसं हात, भांडी, ओटा पुसायचे फडकेही वेगळे असतात.  स्वच्छता हेच ध्येय पण भूमिका वेगवेगळ्या !  

पट्टीचा गायकीवर हुकूमत असलेला गायक जसा जरा असंबद्ध होत नाही. तसं कितीही मोठी तान घेऊनही, भांडी पुसायचं फडकं ती हात पुसायला वापरत नाही. साधी बाटल्यांची बुचंही अदलाबदल करायला घाबरतात तिच्या प्रेमापोटी ! उकळत्या दूधाचं भांडं पकडीत पकडून, दुसऱ्या हातानं साय अडवून, दूध कपाबाहेर न सांडता चहा नितळ ठेवण्याएवढी मोठी कला नाही. आपल्याला चहा पुन्हा गाळावा लागेल नि ओटा पुन्हा एकदा पुसावा लागेल. एकाच वेळी दुधाला उतू जाऊ न देणं नि लेकराला धडपडू न देणं,  ही विश्वाला थक्क करणारी सर्कस वा कसरत तीच करते. पाणी प्रमाणात झेपेल एवढा घोट घेतला तर तहान भागवतं नाहीतर ठसका लागतो. तसा गॅसही ! तो गरजेप्रमाणे कमी जास्त ठेवावा लागतो.  त्याच्या ज्वालेचं प्रमाण बटणावर नसतं. अन्नपूर्णेच्या प्रतिभेवर असतं.

प्रत्येक गोष्ट ती खाऊन पहात नाही. रंग,वास यावरून तिला अंदाज येतो. अंदाज हा माझा पुरुषी अहंकार. अंदाज नसतो, खात्रीच असते ती. आमचा असतो तो अंदाज आणि त्याना असते ती खात्री. अंदाज आणि खात्री यात दडलेली बाई आपण पहात नाही, तेवढा वेळ या कलामंदिरात रहात नाही.

 नेहमी लागणाऱ्या वस्तू मंचावर नि कधीतरी लागणाऱ्या उंचावर, हे तिचं शहाणं नि व्यवहार्य व्यवस्थापन असतं.

ती स्टूलही आणून ठेवते, नि हाक मारते, “अहो,एवढं काढून द्याल का?” आज्ञा आणि विनंतीतलं अंतर म्हणजे माया.  ते ती जपते, पण हातातला पेपर नि त्यातल्या उठाठेवीत ही मायेची ठेव विसरत आपण कुरकुरतो. ती कुरकूर तिच्या तरल संवेदनांना कळते.  आपल्याला फक्त पापडाची कुरकुर कळते.  स्वयंपाकघर ही खोली किती खोल आहे ते ज्याला कधीच कळत नाही, तो पुरुष.  

सर्वात लहान खोली स्वयंपाकाची, त्याहून लहान देवाची.  

एक विश्वाचा स्वयंपाक करते तर दुसरीचं विश्वच स्वयंपाक!

दिवाणखाना मात्र मोठा….परक्यांसाठी. आपल्यांसाठीचा विचार आपण घर बांधतानाही करत नाही. म्हणून नंतर तिला स्मरत नाही !

बेल दिवाणखान्यात वाजते, पण ती फोडणीच्या आवाजातही ऐकू जाते ती याच स्त्रीला. कारण ती पूर्ण घर आतून आपलं मानते.  सारखं करणं या शब्दात * सारखं म्हणजे सतत वा सारखं म्हणजे नीट करणं.*  पण तीच सगळं सतत नीट करत असते.  नुसतं एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाता जाता ती दरवाज्यावरचा टॉवेल सारखा करते, गादीवरचा पलंगपोस सारखा करते. 

पसरणं नि आवरणं, ही क्रियापदं नाहीत, कृती नाही. तर ती वृत्ती आहे –पहिली आपली, दुसरी तिची ! 

आपण पसरायचं, तिनं आवरायचं !

तिच्या दमण्याचा आवाज कधी ऐकणार आपण? लक्षात ठेवा, असं मुलांचं वेळापत्रक, होमवर्क, नवऱ्याचे कपडे, गोळ्या आणि गाड्यांच्या वेळाही लक्षात ठेवणारं स्वयंपाकघर घराबाहेर पडतं , तेव्हा खरं लॉकडाऊन होतं !

” बाहेर ऊन, तर घरात चूल ” , ही फक्त घामाची वेगवेगळी कारणं !  

ठेच लागली तरी डोक्यावरची घागर, आणि ” कमरेवरचं भविष्य ” जी खाली ठेऊ शकत नाही, तिच्याहून मोठी विवेकाची नि सहनशीलतेची कला कुणाला जमणार? 

—-ती थांबेल, तेव्हा पृथ्वीच नाही, त्रैलोक्य लॉकडाऊन होईल !

संग्राहिका : बिल्वा अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वारी… ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ वारी… ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆

◆ कोणतेही इव्हेंट मॅनेजमेंट नाही,

◆ कोणाला निमंत्रण नाही,

◆ कोणत्याही सोशल मीडियावर जाहिरात नाही,

◆ कुठलीच भंपकबाजी नाही,

◆ कोणालाही कसलंही प्रलोभन नाही,

◆ कोणाचा कोणावर राग रूसवा नाही,

◆ कोण खायला घालेल,  की नाहीच , ते पण माहीत नाही, आज मिळालंय, उद्या मिळेल की नाही याची चिंताच     नाही,

◆ खिशात एक रूपयाची पण गरज नाही ,

◆ तरीही संबंध कार्यक्रम निर्विघ्न पार पडतो ,

◆ कुठलंही गालबोट लागत नाही ,

◆ इहलोकी यापेक्षा मोठा सोहळा जगभरात नाही,

◆ म्हणून कोठेच गर्वाचा /अहंकाराचा लवलेशही नाही….

◆ दैदिप्यमान, नेत्रदीपक सोहळा,

◆ डोळ्याचं पारणं फेडणारा….

◆  ऊर भरून आणणारा सोहळा,

◆ श्रीमंतच नाही, गर्भश्रीमंत सोहळा…

◆ अगदी कुबेराच्या श्रीमंतीला देखील लाजवणारी श्रीमंती …

आणि हा सगळा अट्टाहास कशासाठी…

—–तर फक्त…..

मुख दर्शन व्हावे आता…

तु सकळ जनांचा दाता….

घे कुशीत या माऊली…

तुझ्या पायरी ठेवतो माथा …..

 

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आनंद लांबणीवर टाकणारी माणसं – अनामिक ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ आनंद लांबणीवर टाकणारी माणसं – अनामिक ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

बेल वाजली म्हणून दरवाजा उघडला. दारात शिवराम. हा शिवराम आमच्या सोसायटीतल्या लोकांच्या गाड्या-बाईक्स धुवायचं काम करतो.

“ साहेब, जरा काम होतं.” 

“ पगार द्यायचा राहिलाय का माझ्याकडून ?” 

“ नाय साहेब, तो केवाच भेटला. पेढे द्यायचे होते. पोरगा धाव्वी झाला.” 

“ अरे व्वा ! या आत या.” 

आमच्या दाराचा उंबरठा शिवराम प्रथमच ओलांडत होता. मी शिवरामला बसायला सांगितलं. तो आधी नको नको म्हणाला. आग्रह केला तेव्हा बसला. पण अवघडून. मीही त्याच्या समोर बसताच त्याने माझ्या हातात पेढ्यांची पुडी ठेवली.

“ किती मार्क मिळाले मुलाला ?” 

“ बासट टक्के.” 

“ अरे वा !”  त्याला बरं वाटावं म्हणून मी म्हटलं. हल्ली ऐंशी-नव्वद टक्के ऐकायची इतकी सवय झाली आहे  की तेवढे मार्क न मिळालेला माणूस नापास झाल्यासारखाच वाटतो. पण शिवराम खूष दिसत होता.

“ साहेब मी जाम खूश आहे. माझ्या अख्ख्या खानदानात इतका शिकलेला पहिला माणूस म्हणजे माझा पोरगा !” 

“ अच्छा, म्हणून पेढे वगैरे !” 

शिवरामला माझं बोलणं कदाचित आवडलं नसावं. तो हलकेच हसला आणि म्हणाला, “ साहेब, परवडलं असतं ना, तर दरवर्षी वाटले असते पेढे. साहेब, माझा मुलगा फार हुशार नाही, ते माहित्ये मला. पन एकही वर्ष नापास न होता दर वर्षी त्याचे दोन दोन, तीन तीन टक्के वाढले – यात खुशी नाय का ? साहेब, माझा पोरगा आहे म्हणून नाही सांगत, पन तो जाम खराब कंडीशनमधे अभ्यास करायचा. तुमचं काय ते – शांत वातावरन ! – आमच्यासाठी ही चैन आहे साहेब ! तो सादा पास झाला असता ना, तरी मी पेढे वाटले असते.” 

मी गप्प बसल्याचं पाहून शिवराम म्हणाला, “ साहेब सॉरी हा, काय चुकीचं बोललो असेन तर. माझ्या बापाची शिकवन. तो म्हनायचा, आनंद एकट्याने खाऊ नको सगल्य्यांना वाट ! हे नुसते पेढे नाय साहेब, हा माझा आनंद 

आहे !” 

मला भरून आलं. मी आतल्या खोलीत गेलो. एका नक्षीदार पाकिटात बक्षिसाची रक्कम भरली.

आतून मोठ्यांदा विचारलं, “ शिवराम, मुलाचं नाव काय?”

“ विशाल.” बाहेरून आवाज आला.

मी पाकिटावर लिहिलं – प्रिय विशाल, हार्दिक अभिनंदन ! नेहमी आनंदात रहा – तुझ्या बाबांसारखा !

“ शिवराम हे घ्या.” 

“ साहेब हे कशाला ? तुम्ही माझ्याशी दोन मिन्ट बोल्लात यात आलं सगलं.” 

“ हे विशालसाठी आहे! त्याला त्याच्या आवडीची पुस्तकं घेऊ देत यातून.” 

शिवराम काहीच न बोलता पाकिटाकडे बघत राहिला.

“ चहा वगैरे घेणार का ?” 

“ नको साहेब, आणखी लाजवू नका. फक्त या पाकिटावर काय लिहिलंय ते जरा सांगाल? मला वाचता येत नाही. म्हनून…” 

“ घरी जा आणि पाकीट विशालकडे द्या. तो वाचून दाखवेल तुम्हाला !”  मी हसत म्हटलं.

माझे आभार मानत शिवराम निघून गेला खरा, पण त्याचा आनंदी चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता.

खूप दिवसांनी एका आनंदी आणि समाधानी माणसाला भेटलो होतो.

हल्ली अशी माणसं दुर्मिळ झाली आहेत. कोणाशी जरा बोलायला जा, तक्रारींचा पाढा सुरु झालाच म्हणून समजा.

नव्वद पंच्याण्णव टक्के मिळवून सुद्धा लांब चेहरे करून बसलेले मुलांचे पालक आठवले.

आपल्या मुलाला/मुलीला हव्या त्या कॉलेजात प्रवेश मिळेपर्यंत त्यांनी आपला आनंद लांबणीवर टाकलाय म्हणे.

आपण त्यांना नको हसुया. कारण आपण सगळेच असे झालोय “ आनंद  लांबणीवर टाकणारे !”

‘ माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, स्पर्धेत टिकाव कसा लागेल, आज पाऊस पडतोय, माझा मूड नाही !’ – आनंद ‘लांबणीवर’ टाकायच्या या सगळ्या सबबी आहेत हे आधी मान्य करू या.

काही गोष्टी करून आपल्यालाच आनंद मिळणार आहे – पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय ! Isn’t it strange ?

मोगऱ्याच्या फुलांचा गंध घ्यायला कितीसा वेळ लागतो ?

सूर्योदय-सूर्यास्त पाहायला किती पैसे पडतात ?

आंघोळ करताना गाणं म्हणताय, कोण मरायला येणारे तुमच्याशी स्पर्धा करायला ?

पाऊस पडतोय ? सोप्पं आहे- मस्त चिंब भिजायला जा !

अगदी काहीही न करता गादीत लोळत राहायला तुम्हाला ‘मूड’ लागतो ?

माणूस जन्म घेतो त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात.

खरं तर एका हाताच्या बंद मुठीत ‘आनंद’ आणि दुस-या हाताच्या बंद मुठीत ‘समाधान’ सामावलेलं असतं.

माणूस मोठा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबर ‘आनंद’ आणि ‘समाधान’ कुठे कुठे सांडत जातं

आता ‘आनंदी’ होण्यासाठी ‘कोणावर’ तरी, ‘कशावर’ तरी अवलंबून राहावं लागतं.

कुणाच्या येण्यावर-कुणाच्या जाण्यावर. कुणाच्या असण्यावर-कुणाच्या नसण्यावर.

काहीतरी मिळाल्यावर-कोणीतरी गमावल्यावर. कुणाच्या बोलण्यावर- कुणाच्या न बोलण्यावर.

खरं तर, ‘आत’ आनंदाचा न आटणारा झरा वाहतोय. कधीही त्यात उडी मारावी आणि मस्त डुंबावं.

इतकं असून…आपण सगळे त्या झऱ्याच्या काठावर उभे आहोत – पाण्याच्या टँकरची वाट बघत !

जोवर हे वाट बघणं आहे, तोवर ही तहान भागणं अशक्य !

इतरांशी तुलना करत

आणखी पैसे,

आणखी कपडे,

आणखी मोठं घर,

आणखी वरची ‘पोझिशन’,

आणखी टक्के.. !_ 

—या ‘आणखी’ च्या मागे धावता धावता त्या आनंदाच्या झऱ्यापासून किती लांब आलो आपण !

लेखक : अनामिक

संग्राहक : श्री शामसुंदर धोपटे 

चंद्रपूर

मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे।। ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे।। ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

कन्या स्नुषा नृपांची, प्रत्यक्ष रामभार्या ।

पिचली क्षणाक्षणाला, कारुण्यरुपी सीता ।

कामी तिच्या न आले, सामर्थ्य राघवांचे….

प्रत्यक्ष वेळ येता, कोणी नसे कुणाचे  ll १ ll

 

त्यागून सूर्यपुत्रा, कुंती पुन्हा कुमारी ।

कर्णास अनुज माता, सारेच जन्म वैरी ।

कौतुक का करावे, त्या रक्तबंधनाचे ….

प्रत्यक्ष वेळ येता, कोणी नसे कुणाचे  ll २ ll

 

केली द्यूतात उभी, साक्षात कृष्णभगिनी ।

सम्राट पांडवांची, रानावनात राणी ।

पति पाच देवबंधू , तरी भोग हे तियेचे…….

प्रत्यक्ष वेळ येता, कोणी नसे कुणाचे  ll३ll

 

ठेवू नको अपेक्षा, असल्या जगाकडूनी

निरपेक्ष आचरी तू, कर्तव्य प्रेम दोन्ही,

मग चालूदे सुखाने, अव्हेरणे जगाचे  ।।४।।

प्रत्यक्ष वेळ येता, कोणी नसे कोणाचे..

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ लक्झरी म्हणजे काय?… ☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ लक्झरी म्हणजे काय? ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆ 

 अमेरिकेतील सर्वात महागड्या हॉस्पिटलमधून उपचार घेता येणे म्हणजे लक्झरी नाही. 

 लक्झरी म्हणजे निरोगी असणे.

 

 लक्झरी म्हणजे क्रूझवर जाणे असे नाही किंवा प्रसिद्ध शेफने तयार केलेले अन्न खाणे नव्हे.

 लक्झरी म्हणजे  आपल्या स्वतःच्या अंगणात किंवा परसात उगवलेल्या ताज्या सेंद्रिय भाज्या खाता येणे.

 

 लक्झरी म्हणजे तुमच्या घरात लिफ्ट असणे असे नव्हे—

 लक्झरी म्हणजे विनासायास 3-4 मजले चढण्याची क्षमता असणे

 

 लक्झरी म्हणजे मोठे रेफ्रिजरेटर घेण्याची क्षमता असणे असे नाही.तर….

 लक्झरी म्हणजे ताजे शिजवलेले अन्न दिवसातून 3 वेळा खाण्याची उपलब्धता आणि क्षमता असणे.

 

 लक्झरी म्हणजे होम थिएटर सिस्टीम असणे अन त्यावर हिमालयीन मोहीम पाहणे नव्हे.

 लक्झरी म्हणजे हिमालयीन मोहिमेचा शारीरिक अनुभव घेता येणे.

 

 60 च्या दशकात एक कार असणे लक्झरी होती.

 70 च्या दशकात टेलिव्हिजन असणे लक्झरी होती.

 80 च्या दशकात टेलिफोन ही लक्झरी होती.

 90 च्या दशकात संगणक एक लक्झरी होती …

 

 मग आता लक्झरी म्हणजे नेमकं काय ??

 तर आता लक्झरी म्हणजे ——-

—– निरोगी असणे, प्रामाणिक असणे, आनंदी असणे, आनंदी वैवाहिक जीवन असणे, प्रेमळ कुटुंब असणे, प्रेमळ मित्रांची सोबत असणे, गुरुंची सोबत असणे, प्रदूषित नसलेल्या ठिकाणी राहण्याचे ठिकाण असणे—–

 

आणि याच सर्व गोष्टी दुर्मिळ झाल्या आहेत —–

 —–आणि ह्या दुर्मिळ गोष्टी आपणापाशी असणे हीच खरी आजची “ लक्झरी ! “ 

संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कडी… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले☆

सौ अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ कडी… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

घराची ही साधी कडी. पण काम चोख. आतला सुरक्षित आणि बाहेर गेलेल्याला घर सुरक्षित आहे याची खात्री देणारी ही कडी, खरं तर घराची देखणी नथच मानावी. ज्या घराला कडीकोयंडाच नाही ते घर सुरक्षित नाही. कडीशिवाय घर पुरं नाही. आजवर कडीकुलपांनीच स्थावर मालमत्ता सुरक्षित ठेवली. भित्र्या माणसांना कडी सुरक्षितता पोहोचवते. विशेषतः एकटी स्त्री घरात एकटी असेल तर ही कडीच तिला….. मै हुँ ना! असं बेलाशक सांगते. कडी नुसती कडी नसते तर आधारासाठी कायम खडी असते. आपली ती सुरक्षिततेची कवच कुंडल असते. अगदी रात्री घरात एकटे असू… आणि दार नुसतंच लोटलेलं असेल तर झोप लागता लागणार नाही. कडी तिचं काम फारच इमाने इतबारे करते.

मनाच्या दरवाज्यालाही अशा कड्या असाव्यात. वेळोवेळी त्या लावता याव्यात. सताड उघड्या घरात कोण कसं शिरेल आणि विध्वंस करुन जाईल याची नुसती कल्पना करा. आपण अस्वस्थ होतो.

मन जर कायम असं सताड उघडं असेल तर…. कोणीही आपल्याला गृहीत धरून कसेही आपल्याशी व्यवहार करु लागतील. त्यांना जर थोपवायचे असेल तर… मनाची कडी मजबूत असावी. कोणालाही कसेही आपल्या मनात…. जीवनात डोकावता येणार नाही. बऱ्याचदा आपण मनाची कडी लावायला विसरतो आणि मग….. अनेक घोळ होतात. कडी ही आपल्या अस्तित्वासाठी आवश्यकच आहे. म्हणजे मग आपण फार कमी वेळा दुःखी होऊ. म्हणजे इतरही ठराविक अंतराने आणि अदबीने आपल्याशी वागतील.

बोलता बोलता कधी कधी आपण बेताल होतो. वाहवत जातो. पश्चाताप होतो. तोंडाला जरा कडी लावायला हवी होती हे सहज विसरून जातो.

नेमकं आणि योग्य वेळी निर्णायक बोलणारी जी माणसं असतात त्यांच्या शब्दाला सभेत… घरात… समाजात भारी किंमत असते. कोणत्या विषयाला कोठे कडी घालायची हे त्यांना पक्के ठाऊक असते.

कधी कधी नको तिथे मनाला कडी घालणारी माणसं… दुसऱ्याला कायम ताटकळत उभे ठेवतात. आपल्यासाठी जीवतोड करणाऱ्यांच्या बाबतीत ही कडी फार क्लेश देणारी ठरते. आयुष्यभर मग नाव घ्यायचं नाही असं मन ठरवून टाकतं. हे कितपत योग्य आहे.

आगरकर आणि टिळक यांनी  एकमेकांसाठी आयुष्याच्या उत्तरार्धात अशाच कड्या घातल्या. एकत्र शाळा चालवणारे.. शाळा शेणाने सारवणारे हे मित्र खूप दुरावले. शेवटच्या क्षणी मात्र न राहून टिळक आगरकरांना भेटायला गेले. डोळे भरुन एकमेकांना पाहिले. पण बोलले नाहीत. टिळक घराबाहेर पडले आणि आत आगरकरांनी जीव सोडला. टिळकांना अतिव दुःख झाले. पण…. काय उपयोग. मित्र कायमचा गेला.

आपणही जरूर कड्या लावा. पण योग्य तिथेच. नको त्या ठिकाणी लावून बसाल तर फार फार काही गमावून बसाल. योग्य ठिकाणी लावाल तर जीवन हलके कराल.

फक्त ती लावायची कुठे आणि कधी यावर जरुर विचार करा. ही विनंती  आहे.

संग्रहिका : सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नव-यांचे प्रकार… ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ नव-यांचे प्रकार… ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ 

😳😨नवऱ्यांचे प्रकार:

१) प्रेमळ 😄: ह्या ड्रेसमधे तू काय मस्त दिसतेस !

२) उदार 😎: तुला हवी ती साडी घे.

३) समजुतदार : तु आज खूपच दमलेली दिसतेस, चल आज बाहेर जेवायला जाऊ.

४) हौशी : तुझ्यासाठी मोगऱ्याचा गजरा आणलाय बघ.

५) प्रामाणीक 😒: मित्राने खूप आग्रह केला, पण मी फक्त दोनच पेग घेतले. आणी सिगरेट तर अजिबात  ओढलीच नाही. तुला शब्द दिलाय नां ?

६) एकनिष्ठ 😞 : अगं, ती माझी शाळेतली मैत्रीण. पण स्वभावाने एकदम खडूस, तुझ्यासारखी मनमिळावू नाही.

७) कष्टाळू 😟: ऑफिस मधून येताना भाजी घेऊनच आलो, उगाच तुला परत मंडईत जायचा त्रास नको.

८) आज्ञाधारक 🥺 : मित्र पार्टीला बोलवत होता, पण म्हटलं आधी तुला विचारावं आणी मगच कळवावं.

९) स्वाभिमानी ☹️ : मी काय तुझ्या शब्दाबाहेर आहे कां ?

१०) काटकसरी 😖: मोत्यांचा नेकलेस काय करायचाय? मण्यांची माळ घातलीस तरी चालेल. जातीच्या सुंदरीला काहीही शोभतं.

११) धाडसी 😗: तुझी आई आणखीन किती दिवस राहाणार आहे ?

१२) मितभाषी😇 :  हो !

१३) खंबीर 😆: तु म्हणशील तसं, तू आणी मी काय वेगळे आहोत कां ?

१४) आर्जवी 😘: मी चहा करणारच आहे, तूही घे नां !

वरीलपैकी  कोणत्याही कॅटेगरीत नवरा बसत नसल्यास……

आपलंच नशीब खोटं…

असं मानून गप्प बसावे…!

😷🙊

संग्राहक – सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 17 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 17 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

[२४]

 दिवस ढळू लागला आहे,

 पक्षी गायचे थांबले आहेत,

 वाराही वहायचा थांबला आहे.

 अशा वेळी झोपेच्या पातळ पडद्याने,

 माझ्या भोवती अंधाराची चादर लपेटून

 कमळाच्या पाकळ्या मिटून घे.

 

प्रवास संपण्यापूर्वीच माझी शिदोरी संपली आहे

धुळीनं भरलेली माझी वस्त्रं फाटली आहेत

मी गलीतगात्र झालो आहे.

माझी लज्जा, माझं दारिद्र्य दूर कर.

 

दयामय रात्रीच्या पंखाखाली

एखाद्या पुष्पाप्रमाणं माझं जीवन पुन्हा उमलू दे.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तक्रारी थांबव कर्णा! ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ तक्रारी थांबव कर्णा! ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

कर्ण कृष्णाला विचारतो – “माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, कारण मी अनौरस संतती होतो. यात माझी काय चूक होती?

मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं, कारण मी क्षत्रिय नव्हतो.

परशुरामांनी मला विद्या दिली, पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईन . कारण मी क्षत्रिय नव्हतो!

एक गाय चुकून माझ्या बाणांनी मारली गेली, आणि गायवाल्यानी माझी चूक नसताना मला शाप दिला.

द्रौपदीच्या स्वयंवरात मला अपमान सहन करावा लागला.

कुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचवण्यासाठीच सांगितले.

मला जे काही मिळाले ते दुर्योधनाचे उपकार म्हणून मिळाले.—-तर मग मी त्याची बाजू घेतली यात माझे काय चुकले?”

कृष्णाने उत्तर दिले:

“कर्णा, माझा जन्म कारागृहात झाला.

जन्माच्या अगोदरपासूनच मृत्यू माझी प्रतीक्षा करीत होता.

रात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे करावे लागले.

तुम्ही तलवारी, रथ, घोडे, धनुष्यबाण, यांच्या आवाजात लहानाचे मोठे झालात.

मला गौशाला, शेणमाती मिळाली.  आणि मी चालायला पण लागलो नव्हतो तेव्हापासून माझा जीव घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले.

ना कोणती सेना, ना शिक्षण.

मीच त्यांच्या वाईटाचा कारण आहे, असे लोकांकडून मला ऐकायला मिळायचे.

तुमचे गुरु तुमच्या पराक्रमाचे कौतुक करायचे, तेव्हा मला साधे शिक्षण पण मिळाले नाही.

सांदिपनी मुनींच्या गुरुकुलात प्रवेश झाला तेव्हा मी 16 वर्षाचा होतो.

तुम्ही तुमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केले. माझं जिच्यावर प्रेम होते ती मला मिळाली नाही, तर ज्यांची मी राक्षसांच्या तावडीतून सुटका केली त्या माझ्या पदरी पडल्या.

मला माझ्या सर्व समाजबांधवांना जरासंधाच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी यमुना काठापासून नेऊन समुद्राच्या काठी (द्वारका) वसवावे लागले.—–मला पळपुटा (रणछोडदास) म्हणतात.

जर दुर्योधन जिंकला तर तुला भरपूर श्रेय मिळेल. धर्मराज जिंकला तर मला काय मिळेल… फक्त युद्ध आणि नुकसानीचा दोष.

एक गोष्ट लक्षात घे कर्णा…

प्रत्येकाला आयुष्यात कष्ट आहेत. 

आयुष्य कोणासाठीही कधीही सोपे नाही. 

दुर्योधनाच्या आयुष्यात बऱ्याचशा अप्रिय घटना घडल्या आहेत आणि तसेच युधिष्ठिराच्या पण.

परंतु काय योग्य (धर्म) आहे हे तुझ्या अंतरात्माला पण कळते…

कितीही वेळा आपल्या बरोबर अयोग्य गोष्टी झाल्या,

कितीही वेळा आपल्याला अपमान सहन करावा लागला, 

कितीही वेळा आपल्याला आपल्या वाटेचे नाकारले गेले,

तरीही—

त्यावेळी आपण त्याला कसा प्रतिसाद देतो याला महत्व आहे.

तक्रारी थांबव कर्णा!

आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांमुळे तुला अधर्म करण्याचा अधिकार मिळत नाही.

म्हणून, तुमच्या आयुष्यात आलेल्या कठीण व अतिवाईट प्रसंगीदेखील तुम्ही चांगलाच विचार करा, भगवंताचे नामस्मरण करा, कृतज्ञता व्यक्त करा, चांगलंच वागा आणि प्रत्येक माणसाला आणि प्राण्याला सहकार्य करा. स्वच्छंदी व्हा आणि हे विसरून जा कुणी तुम्हाला वेदना दिली की आनंद…!

—— पायातून काटा निघाला की चालायला मजा येते, तसा मनातून अहंकार निघून गेला की आयुष्य जगायला मजा येते…

जय श्रीकृष्ण   

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पाऊस – ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ पाऊस – ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

गोव्याचा पाऊस गोव्याच्या दारू सारखा आहे. 

जशी गोव्याची दारू भरपूर पितात पण चढतच नाही. 

तसा पाऊस भरपूर पडतो पण  दिसतच नाही 

🤪😃

 

कोल्हापूरचा पाऊस…..घरजावयासारखा..

घुसला की…मुक्कामच..

रहा म्हणायची पंचायत…आणि 

जा म्हणायची पण पंचायत…

😃😃

 

अन मुंबईचा पाऊस 

प्रेयसीच्या बापा व भावा सारखा ..

कधी येऊन टपकेल 

धो धो आपल्याला धुउन 🤛🏻🤛🏻 निघून जाईल सांगता येत नाही 

🤣😂😅

 

पुण्याचा पाऊस बायकांसारखा. 

त्या चिडल्या की धड स्पष्ट बोलत नाहीत. 

नुसती दिवसभर पिरपिर चालू . 

पाऊस पण धड रपरपा पडत नाही. दिवसभर पिरपिर रिप रिप भुरभुर चालू असते. नुसता वैताग !

😂 ☔

 

कोकणचा पाऊस ……..

लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा 

एकदा सुरवात झाली की शेवट पर्यंत धो धो धो धो धो धो पडतो …

☔ 💦

 

नी

  खान्देशातील पाऊस म्हणजे लफडं…! 

जमलं तर जमलं नाहीतर सारंच  हुकलं …!!      

☔ 💦

 

बेळगावचा पाऊस सात जन्म मिळालेल्या अनुभविक बायकोसारखा…!

प्रेमाची रिमझिम,आपुलकीच्या धारा 💦

व वरून वर्षाव करत असतात मायेच्या गारा..

️️️

पावसाळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

तुम्हाला अजून कुठला कुठला पाऊस आठवत असेल तर सांगा.

 

संग्राहक : – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares