मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पुण्य करताना पाप… ☆ संग्रहिका – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

? वाचताना वेचलेले ?

☆ पुण्य करताना पाप… ☆ संग्रहिका – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर☆ 

पशुपक्षांना खायला, पाणी प्यायला देणे चांगलेच आहे. पण त्याने त्यांच्या नैसर्गिक सवयींमध्ये फरक पडतो. त्या विषयाची दुसरी बाजू मांडणारा हा लेख. लेखक माहीत नाही पण मते मात्र पटली.********

पुण्य करताना पाप होतंय-……महापाप…..

प्राण्यांना किंवा पक्षांना (कबुतरांना,माकडांना,पोपटांना वगैरे वगैरे) अन्न धान्य खाऊ घालणाऱ्यांच्या बातम्या पाहून आपल्यातला भाबडेपणा जागा होतो ! आणि कौतुक करतो आपण !!!!

प्रथमदर्शनी आपण स्वतःवरच खूश होतो की आपल्या मनात किती पवित्र आणि  सहानुभूतीचे विचार आहेत–

थोडी उसंत घ्या—आधी पुढचे शेवटपर्यंत वाचा :—

निसर्ग, या सर्व जीवांना आपल्या जन्मापूर्वीपासून पोसतोय;

त्यासाठी त्यांच्या आहार विहार आणि प्रयत्नवादाचे प्रोग्रामिंग त्यांच्या मेंदूत by default निसर्गाने टाकले आहे !

वन्य जीवांना आपण आपल्या आवडीचे -सोयीचे पदार्थ, आयते भरवून, त्यांच्या मेंदूतले सेटिंग नष्ट करतोय, त्यांच्या पुढील पिढ्यांना आयतं आणि अनैसर्गिक खाण्याची (ज्याने त्यांना, खाल्ल्यावर वेदना होतात बऱ्याचदा — हे सिद्ध झालंय) सवय लावतोय ! त्यामुळे ते त्यांचे नैसर्गिक अन्न मिळवण्याची क्षमता गमावतात कालांतराने ! त्यांची पिल्लेही अक्षम जन्मतात.

खंडाळा घाटातल्या माकडांना आयत्या वेफर कुरकुरे च्या सवयी आपण लावल्या;

त्यामुळे त्यांची वजने वाढली.–झाडांवरून उड्या मारताना बॅलन्स न झेपल्याने अपंगत्व आले. हाल होत तळमळत मेले शेवटी. 

त्यांच्या पिल्लांना मानवाच्या मदतीशिवाय रानावनातून अन्न मिळवण्याची कला मिळालीच नाही.

परिणामी रस्त्यावरचे भिकारी होण्यापलीकडे भवितव्य उरले नाही. 

outdated ‘ पुण्य ‘ याविषयीच्या कल्पनांनी स्वतःला सुखवण्यासाठी; आणि मुलांना मजा दाखवण्यासाठी

या वन्यजीवांच्या, नैसर्गिक जीवनचक्रात ढवळाढवळ करण्याचे ;खूप वाईट दूरगामी परिणाम त्यांच्यावर होतात-!!!—– आणि हे पाप आपल्या हातून होते !!

—आपल्याला वाटते की आपण किती चांगले काम करतोय–पण आपण त्या जीवांना एकप्रकारे अपंग ( किंवा adict) बनवतो !

आपल्या मुलांना कोणी फ्री मघे 2 पेग दिले, किंवा रोज कोणी 500 ची  नोट बक्षीस दिली तर काही दिवसात मुले बिघडतील— आणि त्यात त्यांचा दोष नसेल. 

असेच झालेय बऱ्याच ठिकाणी!!!

मग हे वन्यजीव सवयीमुळे आक्रमक–कधी हल्लेखोरही होतात–आयत्या चमचमीत अन्नासाठी!!

अष्टविनायकातल्या लेण्याद्री गणपतीच्या डोंगरावर गेलो होतो. 

विपुल वनसंपदा अजूनही आहे तिथे. तिथली माकडे छान नॉर्मल जगू शकली असती.

पण मानवाने हस्तक्षेप करून त्यांच्या सवयी बिघडवल्या !!

आता ती माकडे धाक दाखवून हातातल्या पिशव्या राजरोस लुटतात. फोपशी पण झाली आहेत-

हे पाप कोणाचे?

परदेशात वन्यजीवांना खाऊ घालण्यावर बंदी आहे. त्यामुळे तिथल्या वन्यजीवांच्या नैसर्गिक आहारात आणि जीवन पद्धतीत बदल होत नाही. पुढील पिढी निकोप निपजते.

आपल्या कबुतरांना आता घरटेही बांधता येत नाही, कारण  अनेक पिढ्यांना आपण आयते दाणे टाकले. कबुतरे इतकी वाढली की त्यांनी चिमण्यांची आणि इतर पक्षांची जागा व्यापली. म्हणजे 

इतर पक्षांवर अन्याय.

कबुतरांमुळे अस्थमा ब्रॉंकायटीस होतो हल्ली लोकांना!!!!

कबुतरखान्याजवळच्या लोकांशी बोला—आपल्या बेगडी पक्षीप्रेमापायी त्यांच्या लेकराबाळांना आपल्यामुळे मोठे आजार झाले आहेत.

दुधासाठी पाळल्या जाणाऱ्या गायीला तिच्या मालकाने तिचा आहार देणे अपेक्षित आहे.

मानवी आहाराने गायींना पोटाचे त्रास होतात-पोट फुगते- अपचन होते हे सिद्ध झाले आहे.

या सर्व जीवांना नैसर्गिकपणे जगता येईल अशी नैसर्गिक वनसंपदा जपू या- -देशी झाडांनी ती वाढवूया.

जुन्या काळातल्या ‘  पुण्य ‘ या विषयीच्या संकल्पना तपासून योग्य तिथे विधायक बदल करूयात. 

संतांनी हेच सांगितलंय !

कबुतरांना दाणे टाकणे थांबवूया….. 

तडकाफडकी प्रत्युत्तर देण्याची घाई करू नका—मीही तुमच्याइतकाच प्राणिप्रेमी आहे.

पक्षी प्राण्यांना मानवी आहाराची किंवा दानाची गरज नाही —त्यांचा अधिवास (झाडे, जंगले) राखू या. सखोल अभ्यासातून निघालेले निष्कर्ष समजावून घेतलेत तर आपल्या आवडत्या प्राणी-पक्षांसाठी ते खूप फायद्याचे आहे. 

(सदरहू विषयातील तज्ज्ञांच्या अभ्यासावर मते मांडली आहेत. त्यामुळे फॉरवर्ड करून आपले प्राणी- पक्षी प्रेम व्यक्त करा.)

 

संग्रहिका –  श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सद्गुरू कृपा म्हणजे काय ? ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ सदगुरु कृपा म्हणजे काय☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

पैसा- गाडी- बंगला म्हणजे सदगुरु कृपा नव्हे…

 

आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्या नकळत टळून जातात–

ते टळलेले संकट म्हणजे सदगुरु कृपा..!!

 

गाडीवरून जाताना कुणाचा धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो–

ते सावरणे म्हणजे सदगुरु कृपा..!!

 

एकवेळचे जेवणाचे वांधे असताना मिळालेले दोन वेळचे  पोटभर जेवण म्हणजे सदगुरु कृपा..!!

 

कोसळलेल्या दुःखरुपी डोंगराला पेलण्याची जी ताकत आपल्यात निर्माण होते, ती ताकत म्हणजे सदगुरु कृपा..!!

 

‘आता सर्व संपलं ‘ असं वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते —ती उमेद म्हणजे सदगुरु कृपा..!!

 

अडचणीमध्ये सर्वजण  साथ सोडून गेले असता, ” तू लढ.. आम्ही आहोत सोबत ” हे गुरुबंधूचे शब्द म्हणजे सदगुरु कृपा..!!

 

प्रसिद्धीच्या शिखरावर असतांना तेथूनच हवेत न उडता पाय जमिनीवर ठेवणे, म्हणजे सदगुरु कृपा..!!

 

पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे सद्गुरू कृपा नव्हे ते काहीही नसतानासुद्धा आयुष्यात असलेले ‘समाधान ‘ म्हणजे सदगुरु कृपा..!!

 

।।जय सदगुरु।।

 

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शांतपणाने केवळ अलिप्त व्हा.. ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

?  वाचताना वेचलेले ? 

☆ शांतपणाने केवळ अलिप्त व्हा.. ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

ताज्या फुलांचे आपल्याला कोण कौतुक असते. आणि ती देवाच्या पायांवर वाहिली की आणखी आनंद होतो. फुले घेताना ती ‘माझी’ असतात. पण देवाला वाहिली की ‘त्याची’ होतात…… किती शांतपणे आपण हे स्वीकारतो. अगदी अलिप्त होतो…..    ‘ज्याचे होते त्याला दिले’…. फक्त हा भाव मनात असतो. त्या फुलांची ओढ संपलेली असते.

काल वाहिलेली फुले आज शिळी होतात. निर्माल्य होऊन जातात. मग निरिच्छ मनाने, ती उचलून आपण गंगार्पण करतो…….त्यांच्याप्रती आपल्याला कोणताही मोह नसतो. अपेक्षा नसते. हे कसे सोडू? हा प्रश्न नसतो. पुन्हा त्यांची आठवणही येत नाही. 

अगदी तसेच, आपली दु:खे  ‘त्याच्या’ चरणावर वहायची आणि शांत होऊन जायचे….

त्यांच्याप्रती कोणतीही भावना बांधून ठेवायची नाही…….. आतापर्यंत जी ‘माझी’ दु:खे होती, ती आता ‘त्याची’ झाली. त्यांचा कसला विचार करायचा…..आणि कालची दु:खे तर, आज निर्माल्य झाली. त्यांचा मोह नाहीच धरायचा. त्यांना कवटाळून बसण्याचा काहीच उपयोग नसतो.

शिळ्या फुलांप्रमाणे, मग ती सडायला लागतात. आणि मग मनाला पोखरायला लागतात….म्हणूनच जोपर्यंत ती  निर्माल्य आहेत, तोपर्यंतच गंगार्पण करून मोकळे व्हायचे. 

आज पेरण्यासाठी आपण आनंद आणू ना. धान्याची पेरणी करताना, जशी जमिनीची  मशागत करतात…..तशी मनाची साफ-सफाई करु…. आणि तिथे आनंद पेरु या. तो शतपटीने उगवून येतो…. त्याची जोपासना करु….. त्याचा परतावा जीवन समृद्ध करतो.  म्हणूनच …..

 

“दु:ख सोडून द्यावे,

निर्माल्य बनून जाते.

आनंद पेरत जावा,

समाधान बनून रहाते.”

 

संग्राहक : श्री अनंत केळकर   

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – 22 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – 22 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

 

[१०५]

टेकड्या-टेकड्यांची    

पाकळी न् पाकळी उलगडून

प्रकाश प्राशन करणारा

हा पर्वत

किती गोजिरवाणा दिसतो

एखाद्या प्रफुल्लित फुलासारखा….

 

[१०६]

प्रकाशाने झगमगणार्या 

दिवसाच्या या हिरव्यागार जगाला

स्पर्श करण्यासाठी

उचंबळत आहेत अनावर

माझ्या गीतांच्या

या लालस लाटा

काळजाच्या गाभ्यातून

 

[१०७]

मीलनाची ज्योत

तेवत राहते

रेंगाळत –  रेंगाळत

पण विरहाची फुंकर

फक्त एका क्षणाची

आणि

फटकन विझून जाते ज्योत

 

[१०८] 

संपून गेली एकदाची

दिवसभराची कामं

लपेटून घे मला

तुझ्या आणि तुझ्याच कुशीत

स्वप्नं पडू देत ग मला-  

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बदलतं ते वय, कवी नाही.. ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

? वाचताना वेचलेले ?

☆ बदलतं ते वय, कवी नाही.. ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆ 

बदलते ते वय.

बदलत नाही ती सवय—–

 

भावतो तो भाव.

भोवतो तो स्वभाव—–

 

सतत बदलतो तो रंग.

अविचल असतो तो श्रीरंग—–

 

समज वाढवते ती संगती.

अतिसंगाने जाणवते ती विसंगती—–

 

आतून उमटतो तो सूर.

भावनाहीन सूर तो भेसूर—–

 

वहात जाते ती लय.

वहावत नेतो तो प्रलय—–

 

आनंदाचा शोध ते जगणं.

आनंदही दुरावते ते वागणं—–

 

स्वेच्छेने करतो ते अर्पण.

उपेक्षा करतो तो दर्पण—–

 

ती/तो येता उठती ते तरंग.

ती/तो नसता कण्हते ते अंतरंग—–

 

ति/त्या च्यासह असते ते घर.

ति/त्या च्या विणा उरते ती घरघर—–

 

तन दुखावतं ते शस्त्र.

मन दुखावतं ते शास्त्र—–

 

त्यांच्याकडे असते ती कला.

आमच्याकडे असतात त्या नकला—–

 

ते करतात तो व्यापार. 

आम्हास न जमे तो व्यवहार—–

 

अकस्मात् जडते ते प्रेम.

पुरून उरते ते दृढ सप्रेम—–

 

संग्रहिका – सुश्री माधुरी परांजपे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सह्याद्री :- बाबासाहेबांच्या नजरेतून ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ सह्याद्री :- बाबासाहेबांच्या नजरेतून ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित ☆ 

babasaheb purandare felicitation ceremony: बाबासाहेब पुरंदरेंचा उद्या नागरी सत्कार; निमंत्रितांच्या यादीत 'या' दिग्गजांचा समावेश - shiv shahir babasaheb purandare turns 100 ...

(बाबासाहेब बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांनी केलेले सह्याद्रीचे वर्णन … हे वाचून छातीच दडपून गेली.)

अग्नि आणि पृथ्वी यांच्या धुंद प्रणयांतून सह्याद्रि जन्मास आला. अग्नीच्या धगधगीत उग्र वीर्याचा हा अविष्कारहि तितकाच उग्र आहे! पौरूषाचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे सह्याद्रि!

त्याच्या आवडीनिवडी आणि खोडी पुरूषी आहेत, त्याचे खेळणे-खिदळणेहि पुरूषी आहे, त्यांत बायकी नाजूकपणाला जागाच नाही.  कारण सह्याद्री हा ज्वालामुखीचा उद्रेक आहे. अतिप्रचंड, अतिराकट, अतिदणकट अन् काळा कभिन्न. रामोशा सारखा. पण मनाने मात्र दिलदार राजा आहे तो! आडदांड सामर्थ्य हेच त्याचे सौंदर्य! तरीपण कधीकाळी कुणा शिल्पसोनारांनी सह्याद्रीच्या कानात सुंदर आणि नाजूक लेणी घातली, त्याच्या घोटीव अन् पिळदार देहाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून मराठी मुलुखाने त्याच्या दंडावर जेजुरीच्या खंडोबाच्या आणि कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या घडीव पेट्या बांधल्या, त्याच्या गळ्यात कुणी सप्तशृंग भवानीचा टाक घातला, मनगटात किल्ले कोटांचे कडीतोडे घातले…

सह्याद्रीला इतके नटवले सजवले, तरीपण तो दिसायचा तसाच दिसतो– रामोशासारखा ! तालमीच्या मातीत अंग घुसळून बाहेर आलेल्या रामोशासारखा ! सह्याद्रीचा खांदाबांधा विशाल आहे, तितकाच तो आवळ आणि रेखीव आहे. त्याच्या घट्ट खांद्यावरून असे कापीव कडे सुटलेले आहेत की, तेथून खाली डोकावत नाही, डोळेच फिरतात! मुसळधार पावसात तो न्हाऊ लागला की, त्याच्या खांद्यावरून धो धो धारा खालच्या काळदरीत कोसळू लागतात आणि मग जो आवाज घुमतो, तो ऐकावा. सह्याद्रीचे हसणे, खिदळणे ते ! बेहोश खिदळत असतो.

पावसाळ्यात शतसहस्त्र धारांखाली सह्याद्री सतत निथळत असतो. चार महिने त्याचे हे महास्नान चालू असते. काळ्यासावळ्या असंख्य मेघमाला, त्याच्या राकट गालावरून अन् भालावरून आपले नाजूक हात फिरवित, घागरी घागरींनी त्याच्या मस्तकावर धारा धरून त्याला स्नान घालीत असतात. हे त्याचे स्नानोदक खळखळ उड्या मारीत त्याच्या अंगावरून खाली येत असते. त्याच्या अंगावरची तालमीची तांबडी माती या महास्नानात धूऊन निघते. तरी सगळी साफ नाहीच. बरीचशी. दिवाळी संपली की सह्याद्रीचा हा स्नानसोहळा संपतो. त्या हसर्‍या मेघमाला सह्याद्रीच्या अंगावर हिरवागार शेला पांघरतात. त्याच्या आडव्या भरदार छातीवर तो हिरवा गर्द शेला फारच शोभतो. कांचनाच्या, शंखासुराच्या, सोनचाफ्याच्या व बिट्टीच्या पिवळ्या जर्द फुलांची भरजरी किनार त्या शेल्यावर खुलत असते. हा थाटाचा शेला सह्याद्रीला पांघरून त्या मेघमाला त्याचा निरोप घेतात. मात्र जातांना त्या त्याच्या कानांत हळूच कुजबुजतात, “आता पुढच्या ज्येष्ठांत मृगावर बसून माघारी येऊ हं ! तोपर्यंत वाट पहा !”

रिकामे झालेले कुंभ घेऊन मेघमाला निघून जातात. दाट दाट झाडी, खोल खोल दर्‍या, भयाण घळी, अति प्रचंड शिखरे, उंचच उंच सरळ सुळके, भयंकर तुटलेले ताठ कडे, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, भीषण अन् अवघड लवणे, घातकी वाकणे, आडवळणी घाट, अडचणीच्या खिंडी, दुर्लंघ्य चढाव, आधारशून्य घसरडे उतार, फसव्या खोंगळ्या, लांबच लांब सोंडा, भयाण कपार्‍या, काळ्याकभिन्न दरडी आणि मृत्यूच्या जबड्यासारख्या गुहा ! —–

असे आहे सह्याद्रीचे रूप. सह्याद्री  बिकट, हेकट अन् हिरवट आहे. त्याच्या कुशी-खांद्यावर रहायची हिम्मत फक्त मराठ्यांत आहे. वाघांतही  आहे. कारण तेही मराठ्यांच्याइतकेच शूर 

आहेत ! सह्याद्रीच्या असंख्य रांगा पसरलेल्या आहेत. उभ्या आणि आडव्याही. सह्याद्रीच्या पूर्वांगास पसरलेल्या डोंगरामधील गल्ल्या फार मोठमोठ्या आहेत. कृष्णा आणि प्रवरा यांच्या दरम्यान असलेल्या गल्ल्यांतच चोवीस मावळे बसली आहेत. दोन डोंगर- रांगांच्या मधल्या खोर्‍याला म्हणतात मावळ. एकेका मावळांत पन्नास-पन्नास ते शंभर-शंभर अशी खेडी नांदत आहेत. प्रत्येक मावळामधून एक तरी अवखळ नदी वाहतेच. सह्याद्रीवरून खळखळणारे तीर्थ ओढ्या-नाल्यांना सामील होते. ओढेनाले ते या मावळगंगांच्या स्वाधीन करतात. सगळ्या मावळगंगा हे माहेरचे पाणी ओंजळीत घेऊन सासरी जातात. या नद्यांची नावे त्यांच्या माहेरपणच्या अल्लडपणाला शोभतील अशीच मोठी लाडिक आहेत. एकीचे नाव कानंदी, दुसरीचे नाव गुंजवणी, तिसरीचे कोयना. पण काही जणींची नावे त्यांच्या माहेरच्या मंडळींनी फारच लाडिक ठेवलेली आहेत. एकीला म्हणतात कुकडी, तर दुसरीला म्हणतात घोडी ! तिसरीला म्हणतात मुठा, तर चौथीला वेलवंडी ! काय ही नावे ठेवण्याची रीत ? चार चौघीत अशा नावांनी हाक मारली की, मुलींना लाजल्यासारखे  नाही का होत ? कित्येक मावळांना या नद्यांचीच नांवे मिळाली आहेत. कानंदी जेथून वाहते ते कानद खोरे. मुठेचे मुठे खोरे. गुंजवणीचे गुंजणमावळ, पवनेचे पवन मावळ, आंद्रेचे आंदरमावळ आणि अशीच काही. मावळच्या नद्या फार लहान. इथून तितक्या. पण त्यांना थोरवी लाभली आहे, ती गंगा यमुनांची. सह्याद्री हा सहस्त्रगंगाधर आहे. मावळांत सह्याद्रीच्या उतरणीवर नाचणी उर्फ नागली पिकते. नाचणीची लाल लाल भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कांदा हे मावळचे आवडते पक्वान्न आहे. हे पक्वान्न खाल्ले की बंड करायचे बळ येते ! भात हे मावळचे राजस अन्न आहे. आंबेमोहोर भाताने मावळी जमीन घमघमत असते. अपार तांदूळ पिकतो. काही मावळांत तर असा कसदार तांदूळ पिकतो की, शिजणार्‍या भाताच्या पेजेवर तुपाळ थर जमतो. खुशाल वात भिजवून ज्योत लावा. नाजूक व सोन्यासारखा उजेड पडेल. महाराष्ट्राच्या खडकाळ काळजातून अशी ही स्निग्ध प्रीत द्रवते. मावळे एकूण चोवीस आहेत. पुण्याखाली बारा आहेत व जुन्नर-शिवनेरीखाली बारा आहेत.

मोठा अवघड मुलूख आहे हा. इथे वावरावे वार्‍याने, मराठ्यांनी नि वाघांनीच.

—शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ द्रौपदीचा कृष्ण….गौरव गद्रे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ द्रौपदीचा कृष्ण….गौरव गद्रे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

ती स्टेशनवर बाळाला दूध पाजत होती आणि लोक तिच्याकडे विकृत नजरेने पाहत होते, इतक्यात…

मुंबई, १० एप्रिल – जगात फार कमी लोकांमध्ये माणूसकी आहे असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे मुंबईच्या ट्रेनमध्येही अशी फार कमी माणसं आहेत ज्यांच्या चांगुलपणामुळे आपण कळत-नकळत खूप काही शिकत असतो. मी गौरव गद्रे आज तुम्हाला माझ्यासमोर घडलेल्या घटनेबद्दल सांगणार आहे. अगदी एका छोट्याशा कृतीमधूनही तुम्ही कसा बदल घडवू शकता हे मी त्या अनुभवातून शिकलो.

नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी मी वांद्रे स्टेशनला थांबलो होतो. सकाळची वेळ असल्यामुळे अर्थातच पूर्ण स्टेशन माणसांशी भरून गेलं होतं. ऑफिसला उतरण्यासाठी मला मधल्या डब्यात बसणं सोयीस्कर असल्यामुळे मी लेडीज डब्याच्या मागे असणाऱ्या डब्याकडे ट्रेनची वाट पाहत उभा होतो.

इतक्यात माझ्या बाजूला काही अंतरावर उभ्या असलेल्या एका महिलेचं तान्हं बाळ रडायला लागलं. बाळाच्या रडण्याच्या आवाजामुळे साहजिकच सगळ्यांचं लक्ष तिकडे गेले. बाळाकडे एक कटाक्ष टाकून सगळेजण आपल्या मोबाइलमध्ये, पेपरमध्ये पाहू लागले. थोड्यावेळाने ते बाळ रडण्याचं काही थांबत नव्हतं. आजूबाजूच्या महिलांनीही त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ते शांत होण्यापेक्षा जास्तच रडत होते. त्या आईची परिस्थिती तर पाहण्यासारखी होती. तिने बॅगेतली दुधाची बाटली काढली आणि बाळाच्या तोंडात दिली. पण ते बाळ दूधही पीत नव्हतं.

अखेर तिथल्या महिलांच्या घोळक्यातल्या एका आजीने तिला अंगावरचं दूध पाजायला सांगितलं. तिने सुरुवातीला फक्त हो हो म्हटलं, पण बाळ रडण्याचं शांत होत नाही हे लक्षात येता ती बाळाला घेऊन स्टेशनवरच्याच एका बाकडावर बसली आणि बाळाला पाजू लागली. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी महिलेला बाळाला पाजताना पाहिलं की तिला मॅनर्स नाहीत, अशिक्षित आहे.. एवढ्या लहान बाळाला ट्रेनमधून फिरवतातच का असे अनेक प्रश्न विचारून हैराण करतात. ही घटना घडेपर्यंत मीही त्यांच्यापैकीच एक होतो.

ती महिला शिक्षित होती की अशिक्षित.. सुसंस्कृत होती की नव्हती या नको त्या प्रश्नात अडकण्यापेक्षा ती एक स्त्री होती आणि पाच ते सहा महिन्याच्या बाळाची आई होती हेच महत्त्वाचं आहे. ती बाकड्याच्या कडेला बसून बाळाला पाजत होती. आता आपल्याकडे सार्वजनिक ठिकाणी बाळाला पाजायला बसल्यावर जे होतं तेच वांद्र्याच्या स्टेशनवर होत होतं. काही अपवाद वगळता येणारा जाणारा त्या बाईकडे कटाक्ष टाकून जातच होता. माझं त्या महिलेकडे कमी आणि तिच्याकडे पाहणाऱ्या पुरुषांकडे लक्ष जास्त होतं. आपल्या समाजाची मानसिकता कधी बदलणार हाच एक प्रश्न माझ्या मनात राहून राहून येत होता.

काहींनी तर तिच्याकडे अश्लिल नजरेने पाहायलाही कमी केलं नाही. आपला देश कधीच सुधारणार नाही या मतावर मी येतच होतो, इतक्यात २५ ते २७ वर्षांचा एक मुलगा माझ्यासमोर आला. हाही त्यांच्यापैकीच एक असं मला वाटत होतं. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांपैकी तो एक वाटत होता. जीन्स, टी-शर्ट, कानात इअरफोन्स आणि पाठीला बॅग लावून तो स्टेशनवर उभा होता. त्याने बॅगमधून पेपर काढला आणि तो अगदी सहजपणे त्या महिलेच्या समोर जाऊन उभा राहिला. मी त्याच्याकडेच पाहत होतो, तो नक्की काय करतोय हे माझ्या लक्षात येत नव्हतं.

तो पेपर महिलेला कव्हर करेल अशा पद्धतीने पूर्ण उघडला आणि तो अगदी सहजपणे पेपर वाचायला लागला. एका क्षणासाठी त्या महिलेलाही कळलं नाही की ही व्यक्ती कोण आणि ती अचानक माझ्यासमोर का आली.. पण नंतर काही सेकंदांमध्येच तिला त्या मुलाचा हेतू लक्षात आल्यावर ती फार रिलॅक्स झाली. त्याच्या या कृतीने ती बाई आता पटकन कोणाच्या डोळ्यात येत नव्हती आणि शांतपणे आपल्या मुलाला पाजू शकत होती. त्याची ही काही मिनिटांची कृती पाहून मला खरंच धक्का बसला. ही गोष्ट माझ्या का लक्षात आली नाही… मी अशा पद्धतीने का विचार केला नाही…??? याचाच मला प्रश्न पडला. त्याच्या त्या दोन-तीन पावलांच्या कृतीने माझी विचार करण्याची पद्धतच बदलून टाकली.

प्रत्येक द्रौपदीला असा एखादा कृष्ण भेटायलाच हवा..!!

– गौरव गद्रे 

संग्राहक – सुश्री मीनल केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रार्थना ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रार्थना ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

प्रार्थना म्हणजे ती नाही. जी आपण हात जोडून, गुढघ्यावर बसून देवाकडं काहीतरी मागण्यासाठी केलेली असते…! 

प्रार्थना तीच असते, जी सकारात्मक विचार करून लोकांसाठी काहीतरी चांगली इच्छा करते–, ही खरी प्रार्थना…!!

जेव्हां तुम्ही कुटुंबाच्या पोषणासाठी अत्यंत चांगल्या मनानं स्वयंपाक करता, ती प्रार्थना असते…!!

जेंव्हा आपण लोकांना निरोप देताना, त्यांच्या चांगल्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो, ती प्रार्थना असते…!! 

जेंव्हा आपण आपली ऊर्जा आणि वेळ देऊन एखाद्याला मदत करतो, ती प्रार्थना असते…!!

जेव्हा आपण कोणाला तरी मनापासून माफ करतो, ती प्रार्थना असते.

प्रार्थना म्हणजे कंपनं असतात. एक भाव असतो. एक भावना असते. एक विचार असतो. प्रार्थना म्हणजे प्रेमाचा आवाज असतो.  मैत्री, निखळ नाती, हे सगळं म्हणजे प्रार्थनाच तर असते…!!

? श्री स्वामी समर्थ ?

सग्राहक –  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी अनुभवलेला धर्म ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ मी अनुभवलेला धर्म ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

काही वर्षांपूर्वी गडकोट मोहीमेसाठी गेलो होतो. जाताना धर्माच्या घोषणा देत, जयजयकार करत गेलो होतो. मनात आपल्याच धर्माचा उन्माद टचटचून भरला होता. बरोबर मित्र होतेच, पुण्याजवळ रात्री  मुक्काम होता, आम्ही उघड्यावरच झोपलो होतो. काही मित्रांना थंडी सोसवत नव्हती. ते एका इमारतीच्या आडोश्याला झोपण्यासाठी गेले.  पण त्या इमारतीतल्या सुशिक्षित व स्वधर्मीय लोकांनी हाकलून लावले. दुसऱ्या  दिवशी परत आमची पायपीट सूरू झाली. दुसरा मुक्काम सिंहगडाच्या आणि रायगडाच्या मध्ये असणाऱ्या  एका जंगलात पडला. आदिवासी पाड्यात आम्ही थांबलो होतो. एका आदिवासी बांधवाने चक्क आम्हाला झोपडीत जागा दिली. झोपडी छोटीशीच पण त्याचे मन आभाळासारखे वाटले. त्याच्या त्या झोपडीसमोर कालचा बंगला खूपच खुजा वाटत होता. चालून चालून थकलो होतो, सकाळपासून चालत होतो. तहान खूप लागली होती, जवळ पाणी नव्हते.  त्या बांधवाकडे पाणी मागितले.  पण पाणी थोडे अन आम्ही 25 जण– शेवटी त्या सदगृहस्थाने आमच्यासाठी रात्रीचे पाणी आणून दिले. पाणी दरीतून आणावे लागत होते, त्यात मटका छोटाच.  पण तरीही तो माणूस हेलपाटे मारत होता. अखेर मी त्या सदगृहस्थास म्हंटले,

 ” मामा राहू द्या, नका त्रास घेवू “.  यावर तो आदिवासी म्हणाला– “बाळा माझ्या दारात तू परत कशाला येशील ? माझा तेवढाच धर्म “– तो जे बोलला ते अविस्मरणीय होते, त्याच्या त्या वाक्याने माझ्या डोक्यातला धर्माचा माज, उन्माद झटक्यात उतरला. रात्रभर झोप लागली नाही. मन स्वत:ला प्रश्न विचारत होते, अस्वस्थ होतो. हा आदिवासी म्हणतो तो धर्म कोणता? आम्ही ज्याच्या घोषणा देतोय तो कोणता ? काल बंगल्याच्या आडोश्याला झोपल्यावर हाकलून देणाऱ्याचा  धर्म कोणता ? मन प्रश्नांनी भरून गेले होते. नक्की खरा धर्म कोणता ? आम्ही ज्याचा जयजयकार करत होतो तो की हा आदिवासी म्हणतो तो? जशी रात्र उतरत होती तसा मनातला धर्माचा माज उतरत होता. मन शांत होत होते. त्या दिवशी खरा धर्म गवसला होता. हातातली पोळी कुत्र्याने पळवल्यावर त्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेवून पळणारे संत नामदेव आणि तो आदिवासी दोघे सारखेेच वाटत होते. कुत्र्यात  देव शोधणारे नामदेव अन माणसात धर्म शोधणारा तो आदिवासी सारखेच भासत होते. ठार अडाणी असणारा आदिवासी धर्म जगत होता, आम्ही केवळ घोषणा देत होतो. आमचे मस्तक दुसऱ्या  धर्माविषयी तिरस्काराने भरले होते. मस्तकातला धार्मिक उन्माद दुसऱ्या  धर्माच्या माणसाला माणूस मानायला तयार नव्हता.  ते शत्रू  वाटत होते.  पण त्या माणसाने डोळ्यावरची झापडं काढली. त्याने धर्म शिकवला. धर्म अनुभवला. एका आदिवासी माणसाला जे कळते ते आम्हाला कळत नाही. स्वत:लाच स्वत:ची लाज वाटली. तो माणूस आजही तसाच डोळ्यासमोर दिसतो. खूप काहीतरी गवसल्याचा आनंद तेव्हा मनात दाटला होता. 

—-हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन ही केवळ लेबलं आहेत. माणसाला माणसाचा शत्रू बनवणारा, परस्परांच्या जीवावर उठणारा कोणताही धर्म, धर्म असू शकतो काय ?

संग्रहित…. ! 

 

प्रस्तुती : श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सावली दिवाळीची…-सौ.अरुणा प्रकाश गोखले ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ सावली दिवाळीची… -सौ.अरुणा प्रकाश गोखले ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

(दिवाळी संपली, की एक वेगळीच हुरहुर वाटते. ती व्यक्त केली आहे ,सावली दिवाळीची ..या कवितेतून..) 

दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी,

कोणी काही खट्दिशी,

आकाशकंदील काढत नाही,

संपलेली दिवाळी काही,

त्यामुळे वाढत नाही !

 

दोन दिवस अंगणातही ,

रेंगाळत राहतात पणत्या,

स्नेहाच्या गोलांसह,

संध्येच्या दीपरागांसह.

 

पुसटलेल्या रांगोळ्याही,

मंदपणे विस्कटतात,

संपलेल्या दिवाळीचे रंग,

आणखी गडद करतात !

 

हवेतला फटाक्यांचा गंध,

चुकार फटाक्यांचे फाटके अंग,

कण्हत कण्हत सांगतात,

“संपला दिवाळीचा संग !”

 

कँलेंडरमधली चार दिवसांची,

दिवाळी खरं तर संपली,..

पण अजून रेंगाळतेच ना मनात,

तिचीच पुसट सावली !! 

 

-सौ.अरुणा प्रकाश गोखले.

प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print