मराठी साहित्य – विविधा ☆ फजिती झाली…. पण…. ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

?  विविधा  ?

☆ फजिती झाली…. पण…. ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

असं म्हणतात की दर पाच कोसावर बोलीभाषा बदलते. आणि प्रत्येक भाषेला एक स्वतःचा स्व-भाव असतो. अशातच माझ्या बाबतीत “मराठीने केला मालवणी भ्रतार” अशी अवस्था! त्यामुळे लनानंतर मी अत्यंत शुद्ध(?) अशा पुणेरी मराठीतून एकदम सुद्ध मालवणी भाषेच्या प्रदेशात येऊन पडले आणि अक्षरशः धडपडले. कारण ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय म्हणजे अस्सल मालवणी माणसांशी रोजचाच संपर्क! त्यामुळे घडलेल्या फजितीचे हे किस्से! 

अगदी सुरुवातीला जेव्हा गर्भवती महिला तपासायला यायच्या तेव्हा आमच्यात घडणारे संवाद-

मी:- यापूर्वी कुठे दाखवले होते का?

रुग्णा:- हो, आमेरिक!

मी:- (आश्चर्याने तिला नखशिखांत न्याहाळत) अमेरिका? तुमचे मिस्टर तिकडे असतात का?  रुग्णा:- नाय! आमचे मिशेश(?) हडेच असत.

मी:- मग तुमचे माहेर तिकडे का?

रुग्णा:- नाय! माझा मायार दोडामार्गाक!

मी:- (हैराण होऊन) बरं बरं.. तिकडचे काही तपासणीचे कागद आहेत का? 

रुग्णा:- ह्या बघा तडेचा कार्ड( असं म्हणत आपले  प्राथमिक आरोग्य केंद्रातून दिलेले कार्ड पुढे करते)

मी:- हा हा, म्हणजे तुम्ही सरकारी दवाखान्यात तपासले होते तर…

रुग्णा:- ताच सांगलय मा मगाशी? आमेरिक म्हणून!

मग मला उलगडा झाला की आमच्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ‛आंबेरी’ नावाच्या गावात आहे. त्यामुळे आंबेरीला असे सांगताना या बायका मालवणी भाषेत ‛आंबेरीक’ असे म्हणत आणि मला तो उच्चार अमेरिकेसारखा वाटे.

असेच एकदा साधारण आठ- नऊ वर्षांच्या दोन मुली आल्या. त्यांच्या- माझ्यातील हा संवाद-

मुलगी:- आयेन आपडीची गोळी देऊक सांगलय.

मी:- (गोंधळून)  कसल्या गोळ्या?

मुलगी:- (जवळ येऊन कुजबुजत) आपडीच्या ओ…

मला तर “आपडी- थापडी गुळाची पापडी…” हा खेळच आठवू लागला.   माझ्या चेहऱ्यावरील गोंधळलेले हे भाव तिथेच बसलेल्या आणि डॉक्टर असणाऱ्या माझ्या पतीच्या लक्षात आले. त्यांनी हसत – हसत एका कागदावर काहीतरी लिहून तो कागद माझ्याकडे सरकवला. तेव्हा माझा चेहरा अगदी आरशात पाहण्यासारखा झाला होता. कारण ‛आपडी’ म्हणजे ‛मासिक पाळी’ या नवीन शब्दाची माझ्या डिक्शनरीत नव्यानेच भर पडली होती.

आता मात्र मी पूर्णपणे मालवणी भाषा अवगत केली आहे. तरीसुद्धा रुग्णांची म्हणून एक वेगळीच परिभाषा असते. त्यातलाच हा एक नमुना-

रुग्ण:- बाईनु, गेल्या खेपेक तुम्ही ‛भुनी बुंदी ‘ दिला होतास ना तेना माका एकदम बरा वाटलला. ताच द्या माका.

मी:- अरे, तुला एवढा पित्ताचा त्रास होत असताना मी कशाला तुला बुंदी देईन? आणि असलं काही मी दवाखान्यात कशाला ठेवेन?

रुग्ण:- तुमीच तर दिल्यात.तडे मेडिकलातसून घेवूक चिठ्ठी दिललास. त्याच्याबरोबर खयचो तरी गूळ पण होता.

(हे सर्व ऐकून आपण डॉक्टर नसून हलवाई आहोत की काय अशी मला शंका येऊ लागली.) तेवढ्यात त्याने आधीचे प्रिस्क्रिप्शन काढून समोर ठेवले. त्यावरची नावे बघून मी कपाळाला हात लावला व मुकाट्याने पुन्हा नवीन प्रिस्क्रिप्शन लिहायला सुरुवात केली.  कारण ती औषधे होती- भूनिंबादि काढा आणि योगराज गुग्गुळ!

 सध्या या दीड- दोन वर्षात कोविडमुळे आम्हाला  पेशंट लांबूनच तपासावे लागत आहेत. ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करताना येणाऱ्या रुग्णांची मानसिकता बघता इंजेक्शन नाही आणि प्रत्यक्ष हात लावून तपासणी नाही म्हणजे ‛डॉक्टराक फुकट पैसे देना’ असा समज! अशीच एक रुग्णा व डॉक्टर यामधील घडलेला हा प्रत्यक्ष किस्सा-

डॉ. :- काय गे, हल्ली बरी असस वाटता. बरेच दिवसांनी इलस!

त्यावर बाईचा जवाब इतका लाजवाब होता की बाकीचे रुग्ण डॉक्टरांकडे जरा वेगळ्याच नजरेने बघू लागले आणि डॉक्टरना आता धरणी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरे असे वाटू लागले.

बाई:- काय करूचा येवून? तुम्ही काय आमका हात पन लावनास नाय काय जवळ पन घेनास नाय.

आता काय बोलणार? ! ! !

© डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ज्याचा त्याचा  देव… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

⭐ ज्याचा त्याचा  देव… ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? ज्याचा त्याचा देव्हारा ! ?

परवा एका उद्योजक मित्राच्या, तुम्ही बरोबर वाचलेत, उद्योजक मित्राच्या बंगल्याच्या वास्तुशांतीला जाण्याचा योग आला ! उद्योगपती मित्र असायला मी कोणी नेता थोडाच आहे ? असो ! तर त्याने दिलेले त्याच्या बंगल्याचे “ध्यान” हे नांव वाचून, खाली घसरणारी ढगळ हाप पॅन्ट, त्यातून अर्धवट बाहेर आलेला मळलेला शर्ट आणि नाकातून गळणारे मोती, असे शाळेत असतांनाचे त्याचे त्या वेळचे ध्यान डोळ्यासमोर आले आणि मी मनांतल्या मनांत हसलो ! पण पठ्याने पुढे मोठ्या मेहनतीने पैसा कमवला आणि त्याच्या बरोबर थोडं फार नांव !

बंगल्यात शिरल्या शिरल्या उजव्या हाताला एक मोठ देवघर होतं. अनेक देवादिकांच्या मोठ मोठ्या तसबीरींनी त्याची भिंत भरून गेली होती, पण माझं लक्ष वेधून घेतलं ते तिथल्या जवळ जवळ माझ्या उंचीच्या शिसवी देव्हाऱ्याने ! मित्राची आई त्या प्रचंड देव्हाऱ्या समोर आतील असंख्य देवांच्या लहान मोठ्या मूर्तिची, स्वतः एका चौरंगावर बसून पूजा करत होती ! मला थोडं आश्चर्यच वाटलं, कारण माझा मित्र पक्का नास्तिक आहे हे मला ठाऊक होतं. म्हणून तो देव्हारा बघून मी त्याला म्हटलं, “अरे तू एवढा देव देव कधी पासून करायला लागलास ?” “कोण म्हणत ?” “अरे मग हे एवढ मोठ देवघर त्यात तो भला मोठा देव्हारा, हे कशाचं लक्षण आहे ?” “तुला खोटं वाटेल, पण आजतागायत  मी आपणहून या देवघरात पाऊल ठेवून त्यांच्या पुढे कधीच हात जोडलेले नाहीत किंवा त्यांच्याकडे काहीच मागितलेले नाही ! माझा माझ्या मनगटावर पूर्ण भरोसा आहे !” “मग हे सगळं….” “आई साठी ! त्या देव्हाऱ्यात अनेक देव देवता आहेत, पण मी त्या देव्हाऱ्या समोर डोळे मिटून जेव्हा केव्हा उभा राहतो तेव्हा मला फक्त आणि फक्त त्यात माझ्या आईची मूर्ती दिसते, जिला मी मनोमन नमस्कार करतो, जी माझ्यासाठी सार काही आहे !” त्याच्या त्या उत्तराने मी अंतर्मुख झालो हे नक्की !

मध्यन्तरी बऱ्याच वर्षांनी सुट्टीत गावाला गेलो होतो. एकदा सकाळी गावातून फिरता फिरता, माझ्या लहानपणीच्या शाळेवरून जायची वेळ आली. तेवढ्यात मधल्या सुट्टीची घंटा झाली आणि सगळी चिल्ली पिल्ली आपापल्याला वर्गातून शाळेच्या अंगणात, कोणी खेळायला, कोणी डबा खायला बाहेर उधळली ! मी गेट समोर उभा राहून माझे बालपण आठवत उभा राहिलो ! आताही शाळेत डोळ्यात भरेल असा कुठलाच बदल झालेला जाणवला नाही मला ! नाही म्हणायला, शाळेच्या अंगणातलं पारावरच एक छोटंस मंदिर मला कुठे दिसेना. त्या क्षणी मला काय झालं, ते माझं मला कळलच नाही, मी बेधडक शाळेत शिरून हेडमास्टरची रूम गाठली. तर त्यांच्या त्या खुर्चीत एक चाळीशीची स्मार्ट मॅडम बसली होती.

ओळख पाळख वगैरे झाल्यावर मी त्यांना म्हटलं “माझ्या आठवणी प्रमाणे आपल्या शाळेच्या अंगणात पारावर एक छोटस मंदिर होतं, ते दिसलं नाही कुठे ?” “त्याच काय आहे ना जोशी साहेब, ते मंदिर ना मी इथे बदली होऊन आल्यावर फक्त मागच्या अंगणात शिफ्ट केलंय !” “ओके ! मॅडम, मी आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी असलो तरी मला विचारायचा तसा अधिकार नाही, पण आपल्याला एक प्रश्न विचारला तर राग नाही नां येणार ?” “अवश्य विचारा जोशी साहेब, त्यात राग कसला !” “नाही म्हणजे मला तुम्ही तसं करायच कारण कळेल का ?” “जोशी साहेब मी जेंव्हा इथे चार्ज घेतला, तेंव्हा पहिल्याच दिवशी सगळ्या शिक्षकांना सांगितलं, की मी मंदिर मागे शिफ्ट करणार आहे आणि त्या वेळेस सुद्धा आपल्याला पडलेला प्रश्नच बहुतेकानी मला विचारला !” “मग तुम्ही त्यांना काय सांगितलंत ?” “मी त्यांना म्हणाले, माझी देवावर श्रद्धा आहे पण मी अंधश्रद्ध नाही किंवा त्याचे अवडंबर पण माजवत नाही ! मला असं वाटतं की आज पासून तुम्ही आपापला वर्ग, हाच एक ‘देव्हारा’  मानून, त्यात असलेल्या प्रत्येक विद्यार्थीरुपी नाजूक, ठिसूळ दगडातून  सगळ्यांना हवी हवीशी सुबक छान, मूर्ती घडवायच अवघड काम करायच आहे ! तीच त्या प्रभूची सेवा होईल असं मला वाटतं. माझं म्हणणं त्यांना पटलं आणि त्यांनी त्या प्रमाणे वागून, कामं करून गेली सतत पाच वर्ष ‘तालुक्यातील उत्कृष्ट शाळा’ हे बक्षीस आपल्या शाळेला मिळवून दिलं आहे जोशी साहेब !” मॅडमच ते बोलणं ऐकून काय बोलावे ते मला कळेना ! मी त्यांना फक्त नमस्कार केला आणि शाळे बाहेर पडलो ! घरी जातांना, त्या चिमुकल्यांचा चिवचिवाट बराच वेळ कानावर पडत होता !

डिसेंबरचे कडाक्याच्या थंडीचे दिवस होते. कशी कुणास ठाऊक, पण पहाटे पाच वाजताच जाग आली आणि या अशा थंडीत मस्त आल्याचा, गरमा गरम चहा प्यायची इच्छा झाली ! बायकोला उठवायचं जीवावर आलं, म्हटलं बघूया स्टेशनं पर्यंत जाऊन कुठली टपरी उघडी आहे का. कपडे करून खाली उतरलो. रस्त्यावर तसा शुकशुकाट होता. एरवी भुकणारी कुत्री पण दुकानांच्या वळचणीला गप गुमान झोपली होती. लांबून एका रस्त्यावरच्या चहाच्या टपरीचा दिवा पेटलेला दिसला आणि माझा जीव जणू चहात पडला म्हणा नां ! जवळ जाऊन बघितलं तर तो सामानाची मांडा मांडच करत होता. “अरे एक कडक स्पेशल मिळेल का ?” “साहेब पाच मिनिट बसा. आत्ताच धंदा खोलतोय बघा.” मी बरं म्हणून त्याच्या टपरीच्या बाकडयावर बसलो. थोडयाच वेळात त्याने रोजच्या सवयी प्रमाणे, चहा उकळल्याचा अंदाज घेवून, तो चहा दुसऱ्या भांड्यात एका फडक्याने गाळला. आता फक्त काही क्षणांचाच अवधी आणि ते पृथ्वीवरचे अमृत माझ्या ओठी लागणार होतं ! त्याने मग दोन ग्लास घेवून एका ग्लासात पाणी ओतलं आणि एका ग्लासात चहा. ते पाहून मी आधाशा सारखा हात पुढे केला, पण त्याने माझ्याकडे सपशेल दुर्लक्ष करून, ते दोन ग्लास आपल्या हातात घेतले आणि मेन रोड वर जाऊन काहीतरी मंत्र म्हणून, पहिल्यांदा पाण्याचा आणि नंतर चहाचा ग्लास असे दोन्ही रस्त्यावर ओतले ! मला काहीच कळेना ! इथे त्याच पहिल बोहनीच गिऱ्हाईक चहासाठी तळमळतय आणि त्याने तो चहाचा पहिला ग्लास चक्क रस्त्यावर ओतला ! मी काही विचारायच्या आतच त्याने दुसरा चहाचा ग्लास भरून माझ्या पुढे केला. मी चहा पिता पिता त्याला म्हटलं  “अरे तो ताजा चहा आणि पाणी रस्त्यावर कशाला टाकलंस?” “साहेब मी रोजचा पहिला चहा देवाला अर्पण करतो बघा !” “देवाला ? अरे पण मला त्या मेन रोडवर तुझा कुठला मुदलातला ‘देव्हाराच’ दिसत  नाही आणि तुला त्यातला देव दिसून त्याला तू तुझा पहिला चहा अर्पण पण केलास ! खरच कमाल आहे तुझी !” “साहेब कमाल वगैरे काही नाही. माझ्या बापाने सुरु केलेली ही टपरी आता मी चालवतोय, पण त्याने शिकवल्या प्रमाणे हा रोजचा रीती रिवाज मी न चुकता पाळतोय बघा ! साहेब शेवटी देव सगळीकडे असतो असं म्हणतातच नां ? प्रश्न फक्त श्रद्धेचा असतो, खरं का नाही ?” त्याच्या या प्रश्नावर मी फक्त हसून मान डोलावली आणि त्याला पैसे देऊन सकाळी सकाळी मिळालेल्या सुविचाराचा विचार करत घरचा रस्ता पकडला !

मंडळी, शेवटी कोणाचा ‘देव्हारा’ कुठे असेल आणि त्यात तो किंवा ती कुठल्या देव देवतांची पूजा अर्चा करत असतील, हे सांगणे तसे कठीणच ! शेवटी, तो चहावाला मला म्हणाला तसं, प्रश्न शेवटी श्रद्धेचा असतो, हेच त्रिकाल बाधित सत्य, नाही का ?

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ करवंदं …. ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?  विविधा ?

☆ करवंदं ….. ☆ सौ राधिका भांडारकर ☆

शाळा सुटली ,पाटी फुटली,आई मला भूक लागली…

बाळपणीच्या या गंमत गाण्याचा अर्थ आता निराळेपणाने ऊलगडतो…खरंच बाल्य संपतं..जीवनाला निराळे फाटे फुटतात..

वळणं बदलतात..आणि आठवणींची भूक मनांत वाढत जाते..

अशीच अवचित सुधाची आठवण आली.

काय गंमत असते ना? बदलत्या वयाबरोबर अनेक नवी माणसं आपल्या भोवती गोळा होतात. काहींशी नाती जमतात .काही तात्पुरती कामापुरतीच राहतात.

पण या गुंतवळ्यातही दृष्टीआड असल्या तरी मनात घट्ट रूतलेल्या काही व्यक्ती असतातच आपल्या बरोबर!

त्यातलीच सुधा!

माझी बालमैत्रिण. त्या अबोध ,अजाण वयात मी तिच्यावर विलक्षण प्रेम केलं आणि तिनही तेव्हढच!

 एका सुखवस्तु कुटुंबात, लाडाकोडात वाढत असलेल्या मला,आईवडीलच नसलेल्या, म्हातार्‍या आजीबरोबर,पत्र्याचे छप्पर असलेल्या एक खणी घरात राहणार्‍या सुधाबद्दल मला असीम आपुलकी होती!

ती एक निरपेक्ष निरहंकारी निरागस मैत्री होती.

शाळेत एका बाकावर बसून आम्ही चिंचा बोरं खाल्ली.

एकमेकींच्या वह्यांमधे चित्रं काढली.

शाळेतल्या आंब्याच्या पार्‍यावर बसून खूप गप्पा केल्या.गाणी म्हटली, गोष्टी सांगितल्या.

एकत्र शिक्षा भोगल्या. एकत्र रडलो .एकत्र हसलो.

एक दिवस ग्रामदेवीच्या यात्रेत सुधाला मी करवंदं विकताना पाहीलं.

मला कससंच झालं.मी वडीलांना तिच्या टोपलीतील सगळी करवंद. विकत घ्यायला लावली.

संध्याकाळी शुभंकरोती म्हणताना,मी प्रार्थना केली,

“देवा, सुधाला सुखी ठेव..तिला खूप पैसा संपत्ती दे!”

  पण दुसर्‍या दिवशी सुधा शाळेत माझ्याशी बोलली नाही.

मी अबोल्याचं कारण विचारलं तेव्हां ती फटकारुन म्हणाली,”तुला ‘ग’ ची बाधा झाली आहे.पैशाचा तोरा आलाय् .तू स्वत:ला समजतेस काय?

मग लक्षात आले.

मी सुधाचा अभिमान दुखावला.मी मैत्रीच्या भावनेनं केलं, पण सुधा दुखावली.

मी रडले. तिच्या विनवण्या केल्या.पण ही धुम्मस काही दिवस राह्यलीच.

पण नंतर पावसाची सर कोसळुन जावी अन् वातावरण हिरवंगार शीतल व्हावं,तसं आमचं भांडण मिटलं.

आम्ही पुन्हा एक झालो…

कुठल्याच भिंती आमच्या मैत्रीच्या आड आल्या नाहीत.

ज्या गंमतीने माझ्या प्रशस्त सजवलेल्या घरात, आम्ही पत्ते, चौपट, काचापाणी खेळलो, तेव्हढ्याच मजेत तिच्या घरात शेणानं सारवलेल्या जमिनीवर, कोळशानं रेघा मारुन टिक्कर खेळलो. पावसाळ्यात तिच्या एकखखणी घराभोवती गुढघा  गूढघा पाणी साचायचं. त्यात कागदाच्या होड्या सोडायचो..

खूप मज्जा…

 

शाळा संपली.

बाल्य सरले.

वाटा बदलल्या..

नकळत सुधाचा हात सुटला.

पण निरागस मैत्रीचं हे नातं विस्मरणात गेलं नाही.

कारण त्या नात्यानेच संस्कार केले.जडणघडण केली.

जमिनीवर राहण्याचा मंत्र दिला…

अजुनही वाटतं कधीतरी हरवलेली सुधा भेटेल.

आणि माझ्यासाठी पानाच्या द्रोणात आंबट गोड करवंदं घेऊन येईल…….

मी वाट पाहत आहे …

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मुलांना कसे वाढवावे? भाग-3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ मुलांना कसे वाढवावे? भाग-3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(कौशिक प्रकाशन, सातारा, यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी झालेल्या निबंध स्पर्धेतील प्रथम पुरस्कार मिळालेला लेख.)

मुलांना कसे वाढवावे?

((पालकांनी घरात शिक्षकांबद्दल अनुद्गार काढू नयेत. त्याचा परिणाम म्हणून  मुलांच्या मनात  त्यांच्याविषयी अढी बसते.) इथून पुढे —

मुलांना मैदानी खेळांमध्ये भाग घ्यायला जरूर पाठवावे .त्यामध्ये यश- अपयश हे ठरलेलेच असते. त्यामुळे यशाच्या आनंदाबरोबर अपयशही पचविण्याची सवय होते. यश- अपयशाच्या पलीकडे जाऊन ,भविष्यकाळ कसा घडवता येतो, याची उदाहरणे त्यांच्या मनावर लहानपणापासूनच बिंबवायला हवीत. अब्दुल कलाम, नरेंद्र मोदी, नारायण मूर्ती, अंबानी, अमिताभ बच्चन , सचिन तेंडुलकर ,हे काही एका क्षणात मोठे झालेले नाहीत .त्यांची जिद्द, आत्मविश्वास ,प्रयत्नांची पराकाष्ठा, शिस्त, आदर्शाचा अंगीकार आणि आत्मपरीक्षण मुलांच्या समोर, शाळेत व घरात दाखवायला हवे. मुलांच्या हित- अहिताच्या गोष्टींची समजुतीच्या शब्दात त्यांना जाणीव करून द्यायला हवी .’कसे जगावे,’ याबाबत व्यायाम, प्राणायाम, ध्यान ,भाषणे यांच्या माध्यमातून भरणाऱ्या शिबिरांना त्यांना जरूर पाठवावे .त्यातून खूप फरक पडतो ,असा माझा अनुभव आहे. व्यायामाबरोबर आहार शक्य तितका शाकाहारी व सात्विक देण्याची जबाबदारी पालकांची आहे असे मला वाटते. शक्यतो बाहेरचे आणि जंक फूड खाणे योग्य नाही. दुष्परिणाम लगेच दिसत नाहीत. पण  स्लो पॉइझनिंग सुरू होते. घरात ताणतणाव वाटल्यास, घरात स्वास्थ्यसंगीतही लावावे.

मुलांना वाढवत असताना घर, शाळा याबरोबरच बाहेरच्या समाजातही ती वाढत असतात. एखाद्या मुलाचा पाय घसरला असे वाटत असेल तर ,इतरांनी ती गोष्ट पालकांना सांगायला हवी व त्याबद्दल पालकांनी राग मानू नये. तरुण पिढीला सर्वांनी मिळून घडवायला हवे .ब्ल्यू व्हेल, सारख्या चोकिंग गेम , हफिंग, डस्टिंग ,एबीसी स्क्रँचिंग अशा सगळ्या गेम्सवर सरकारकडून बंदी आणण्याचे प्रयत्न करायला हवेत. आर्थिक आणि सामाजिक कारणांमुळे अडचणीत असलेल्या मुलांना सामाजिक पाठबळ देऊन, ‘समाज आणि मुलांचे वाद सामंजस्याने मिटविणारी व्यासपीठे’ व्हायला हवीत. अध्यात्मिक विचारधारेतून त्यांच्यामध्ये उत्साह व महत्त्वाकांक्षा निर्माण केली पाहिजे. “नीरक्षीरविवेक आत्मनात्मान “.

मनुष्यजन्म ही परमेश्वराची महान देणगी आहे. आयुष्य हे जन्म आणि मृत्यू यामधील प्रवास आहे .तो प्रवास वाटेत  गाडीतून उडी न मारता, सर्वांसोबत आनंदाने ,उत्साहाने, खेळीमेळीने असा करावा.  ‘आनंद ‘ हा इप्सित स्टेशन पर्यंत गोळा करत रहावा . गेलेला काळ परत मिळत नाही.  आलेल्या अडचणींचा स्वीकार करून, त्यांना पुढे जायला प्रवृत्त करायला हवे. लहानपणापासून मुलं खरोखरीच आदर्श विचारधारेत वाढली तर ती म्हणत रहातील,—-

“आज जाणिले,आम्ही जन्मलो राजहंस की होण्यासाठी,

आज जाणिले, या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी.”

——आणि हेच पद ती मुलं मित्रांमध्ये पसरवतील.

शेवटी सांगावसं वाटतं की, खरोखरीच पाल्यांच्या बाबतीत पालक काळजीत पडलेले आहेत. प्रत्येकालाच आपली मुलं सद्गुणी, सद्वर्तनी, स्मार्ट व्हायला हवीत असं वाटत असतं. स्वतः पाल्य, पालक ,शाळा आणि समाज सगळ्यांनी जर या बाबतीत जागरूकता दाखवली तर, सुदृढ

व्यक्तिमत्व असलेली तरुण पिढी ,जी राष्ट्राचा आधार आहे ,ती राष्ट्रोद्धारक होईल यात शंका नाही. हीच पिढी भारताला महासत्ता बनविणार आहे. ही गोष्ट एकट्या दुकट्याने करण्याची नाही, तर सर्वांनी मिळून, सर्वांच्या मुलांसाठी हातभार लावायला हवा, असे आवर्जून म्हणावेसे वाटते..

ॐ सहनाववतु सहनौभुनक्तु ।
सह वीर्यं करवावहै
तेजस्विनावधीतमस्तु ।
मा विद्‌विषावहै
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ।

समाप्त

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मुलांना कसे वाढवावे? भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ मुलांना कसे वाढवावे? भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(कौशिक प्रकाशन, सातारा, यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी झालेल्या निबंध स्पर्धेतील प्रथम पुरस्कार मिळालेला लेख.)

(पौगंडावस्थेतील मन अत्यंत संवेदनशील असल्यामुळे चांगले किंवा वाईट लक्षात न घेता कोणत्यातरी आकर्षणाच्या मागे धावायला लागते, असं मानसोपचार तज्ञांचं मत आहे.) —– इथून पुढे—-

मुलांना वाढवत असताना  त्यांच्या वयाचा विचार करता, अगदी लहानपणापासून ते सात आठ वर्षापर्यंतची ,आणि नऊ दहा वर्षापासून ते  टीनएज पर्यंतची ,व पुढची मुलं असा विचार करावा लागेल .अगदी लहान असताना मुलं अनुकरणातून शिकत असतात. बिंब जसे असेल तसेच प्रतिबिंब पडणार. त्यामुळे पालकांनी आपल्यापासून सुरुवात करावी. त्यांना संस्कार वर्गाला पाठवावं. ज्यायोगे त्यांच्या वर्तणुकीत फरक पडतो .मूल थोडे मोठे झाले की, शाळेत जायला लागते.  घरी आल्यानंतर घरात कोणीतरी असले की त्याला आनंद होतो. शाळेत घडणाऱ्या गोष्टी सांगायला त्याला कोणीतरी हवं असतं. त्याला आधार हवा असतो. त्यामुळे त्याला प्रेमाचा ओलावा मिळतो.  ऊब मिळते. एक उपाय मला आवर्जून सांगावासा वाटतो की, वृद्धाश्रम आणि बालवाड्या जवळ-जवळ असाव्यात.  त्यांना एकमेकात मिसळून द्यावे. ज्यायोगे, वृद्धांना बोधपर ,प्रेरणादायी अशा गोष्टी मुलांना सांगता येतील. मुलांनाही आजी-आजोबा, आणि वृद्धांना नातवंडांचा सहवास मिळेल. मुलं थोडी मोठी झाली की, स्वतःचे स्वतः काही प्रमाणात निर्णय घ्यायला लागतात. त्यांना ते तसे घेऊ द्यावेत. चूक होणे स्वाभाविक आहे .पण अशा वेळी सतत चुकीचा पुनरुच्चार न करता,

चुकीची दुरुस्ती करून सांगावी. “तुला काय येतय? तो बघ किती हुशार आहे”. असं म्हणून आपल्या मुलाची सतत दुसऱ्या मुलांशी तुलना करू नये. त्यांना आश्वासक अशा सहवासाची, प्रेमाची गरज असते .बऱ्याच वेळा आपणच त्यांना समजून घ्यायला कमी पडतो असं मला वाटतं .चूक स्वीकारणं, चूक सुधारणं आणि चुकायचं टाळणं हे त्यांना पटवलं पाहिजे. भूतकाळातील चुका,  त्यासाठीच्या शिक्षा या भविष्यकाळातल्या यशाच्या पायऱ्याही बनू शकतात. मुलं पौगंडावस्थेत आली की, संवेदनशील बनतात. त्यांचं  स्वतःचं  एक व्यक्तिमत्व घडत असतं. त्यांना कोणी अपमान केलेला आवडत नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे त्यांनी करावी ,अशी पालकांनी अपेक्षा बाळगणं योग्य नाही. त्याच्या कुवतीप्रमाणे अपेक्षा बाळगाव्यात. नाहीतर “श्यामची मम्मी” नाटकातील श्यामची अवस्था पहावी लागेल. जे पालक मुलांना चुकांमधून शिकण्याची हिम्मत देतात, चुका दुरुस्त करून सांगतात ,तेच पालक मुलांसमोर आदर्श ठरतात. अभ्यास करताना, त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकून, विचारविनिमय करून, प्रोत्साहन दिलं तर, ती एक पाऊल नक्कीच पुढे टाकतील. या वयात मुलांना विरुद्धलिंगी आकर्षण वाटणे नैसर्गिक आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार किंवा अतिरेक होत नाही ना, इकडे लक्ष द्यायला हवे. त्यांचे मित्र मंडळ कसे आहे? मुलाचं वागणं कसं आहे? याकडेही लक्ष द्यायला हवं .आजच्या विज्ञान युगात मुलांसोबतचा संवाद हरवत चाललाय. पालकांनी कौटुंबिक सुसंवाद आणि मित्रत्वाचं नातं जपायला हवं. सामाजिक प्रतिष्ठेपायी मुलांनी अमुकच व्हायला हवं, असं त्यांच्यावर दडपण आणलं आणि अपेक्षाभंग झाला तर सर्वांनाच निराशाजनक समस्यांना तोंड द्यायची वेळ येते.

मुलांचा जवळ-जवळ  अर्धा दिवस शाळेत जातो. त्यामुळे ती बऱ्यापैकी शाळेत घडतच असतात .वाढत असतात. अधून मधून पालकांनी शिक्षकांकडे पाल्याबाबत चौकशी करावी. शिक्षकांनीही शुद्ध चारित्र्य ठेवायला हवे. तर-तम भाव न ठेवता, मुलांना समान वागणूक द्यायला हवी .शिक्षणात विद्यार्थ्याचा कल कुणीकडे आहे, हे शिक्षकांनी पालक सभा घेऊन सांगावे.  पालकांनी घरात शिक्षकांबद्दल अनुद्गार काढू नयेत. त्याचा परिणाम म्हणून  मुलांच्या मनात  त्यांच्याविषयी अढी बसते.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मुलांना कसे वाढवावे? भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ मुलांना कसे वाढवावे? भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(कौशिक प्रकाशन, सातारा, यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी झालेल्या निबंध स्पर्धेतील प्रथम पुरस्कार मिळालेला लेख.)

ईशावास्य उपनिषदामधे एक श्लोक आहे.—

  कुर्वन्नेवेह कर्माणि जिजिविषेत् शतं समाः|

  एवं त्वयि नान्यंथेतोsस्ति न कर्मं लिप्यते नरे ||

वाट्याला आलेली कर्मे करीतच शंभर वर्षे( पूर्ण आयुष्य) जगण्याची इच्छा धरावी. तसेच ‘उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात ‘ या महामृत्युंजय मंत्रात,आत्महत्या न करता, भोग भोगून अमृताच्या मार्गाने जावे असे म्हटले आहे. अध्यात्मातील असा विचार सांगण्याचं  प्रयोजन काय ? तर सद्यस्थितीत ते सांगण्याची नितांत गरज भासायला लागली आहे. मुलांना कसे वाढवावे, याचा विचार करताना सध्या दिसणारे समाजाचे चित्र कसे आहे? ते तसे का आहे? आणि त्यावर कौटुंबिक, सामाजिक,आर्थिक, नैतिक उपाय काय? याचा विचार करावा लागेल.

अगदी माहितीतली उदाहरणे–हुशार सुजय चुकीच्या  रिझल्टमुळे नापास झाल्याचं  कळलं आणि त्याच रात्री त्याने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. सुदेश उत्तम मार्काने फार्मसी पास झाला, पण बरोबरीच्या मित्राला मार्क कमी पडूनही आरक्षणातून नोकरी मिळाली. आणि  बेकार अवस्था असह्य होऊन सुदेशने घरातल्याच पंख्याला लटकवून घेतलं . सुधीर इंजिनीअरिंगला नापास झाला,  आणि त्याने गच्चीतून उडी मारली. सावित्री परधर्मीय मुलाच्या प्रेमात पडली. पण नंतर त्याचा कावा लक्षात आल्यावर तिने रेल्वेखाली उडी घेतली. शाळेतील मुलं गट करुन शिक्षकांना धमकावतात.  क्लबमध्ये जातात. अफू, चरस, गांजा, मेफ्रेडोन, यासारख्या अमली पदार्थांच्या आहारी जातात. जगाच्या कुठल्याही भागातून त्या वस्तू घरपोच मिळू शकतात. खेदजनक गोष्ट अशी की ,महाराष्ट्र याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सहलीच्या नावाखाली समुद्र, पूर, धबधबा अशा ठिकाणी, दारू पिऊन, सेल्फीच्या नादात कित्येक जीवांचा बळी गेलाय. रेव्ह पार्ट्या, बर्थडे पार्ट्या, यासाठी लागणारा पैसा आणि त्या पैशासाठी वेगवेगळे विकृत मार्ग, अशी श्रुंखला सुरू होते. ब्लू व्हेल या गेमने तर पालकांची झोप उडवली होती. उच्चशिक्षित, उच्चपदस्थ, सुसंस्कृत घरातला  म्हैसकर, चौदा वर्षांचा मनप्रीतसिंग , तामिळनाडूतला बारा वर्षांचा मुलगा, अशी बोलकी उदाहरणं

पालकांच्या चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झाली आहेत. काळजीन पोखरुन काढलंय त्यांना ! डिजिटल क्रांतीनंतर आँनलाईन गेमच्या नादात जगात असंख्य बळी गेले आहेत. सुरुवातीला मोबाइल गेम, नंतर लॅपटॉप व आँनलाईन गेम यांचे व्यसन, आणि नंतर त्यातून सुटका नाही, असे दुष्टचक्र सुरू होते. ब्ल्यू व्हेल गेममधे तर हॉरर गोष्टींपासून सुरुवात होते. हातावर तीक्ष्ण हत्याराने माशाचा आकार, उंच इमारतीच्या कठड्यावर चढणे, आणि शेवटी पन्नासाव्या टास्कला विजय घोषित करून आत्महत्या—–या गेमचा निर्माता फिलिप बुडेकिन आता तुरुंगात आहे. पण समाज स्वच्छ करण्यासाठी ( जैविक कचरा ) हा गेम सुरू केल्याचे तो सांगतो. या खेळाने भारतातही हात पाय पसरले होते. पौगंडावस्थेतील अनेक मुलांना अस्वस्थता आणि नैराश्याचा आजार जडल्यासारखे झाले आहे.

मुलं अशी भन्नाट का वागतायत, याच्या कारणांच्या मुळाशी जाऊन विचार करायला हवाय. विभक्त कुटुंब पद्धती सुरु झाली आणि मुलांचा आधार हरवला गेला. आई आणि वडील दोघेही नोकरीला जातात.रात्री कंटाळून परत आल्यानंतर मुलांशी संवाद साधायला, त्यांच्यासाठी वेळ द्यायला ते कमी पडतात. कोणाचंच नियंत्रण नाही, इंटरनेट वर किती वेळ आणि काय पहातात हे कोण विचारणार ? लहान असताना पाळणाघर, नंतर शाळा, अशावेळी प्रेमाचा ओलावा शोधत शोधत गेमच्या आभासी दुनियेत रमायला लागतात. घरातील वातावरण जर तणावपूर्ण असेल, आई वडील जर सतत भांडत असतील तर मुले एकतर आक्रमक तरी होतात, नाहीतर  बुजरी अबोल एकलकोंडी होतात. पौगंडावस्थेतील मन अत्यंत संवेदनशील असल्यामुळे चांगले किंवा वाईट लक्षात न घेता कोणत्यातरी आकर्षणाच्या मागे धावायला लागते, असं मानसोपचार तज्ञांचं मत आहे.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बंद दरवाज्या पलिकडले गूढ… ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ बंद दरवाज्या पलिकडले गूढ… ☆ श्री अरविंद लिमये ☆

हा एक बंद दरवाजा.तो सहजपणे कधीच, कुणालाच उघडता येणारा नाहीय.या बंद दरवाजाआड लपलेले आहे एक गूढतत्त्व. ईशतत्त्व.त्याचं परिपूर्ण ज्ञान प्राप्त होण्यासाठी त्या ज्ञानप्राप्तीची आंस असणं महत्त्वाचं.ती असेल त्याला काहीही करून त्या ज्ञानप्राप्तीस अत्यावश्यक अशी स्वतःची योग्यता सिध्द करावी  लागेल.ती होताच कुणीही न ढकलता, कोणत्याही मंत्रांविना तो बंद दरवाजा त्याच्यापुरता उघडला जाईल.हे दार उघडणं त्याच्यासाठी त्या ब्रम्हज्ञानाचं गूढ उकलणं असेल आणि तो क्षण अर्थातच त्याच्या आत्म्याचं परमात्म्यात विलीन होण्याचा.

त्या बंददरवाजाच्या पलिकडचे गूढतत्त्व हा आपल्या प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा आहे.चार वेद आणि उपनिषदे हे सर्व त्या गूढतत्त्वाचं आकलन करुन घेण्याचा एक मार्ग.हे ज्ञानप्राप्तीचे मार्ग गुरुकुल पध्दतीत गुरुकडून शिष्याला सांगितले जायचे.’उपनिषद’या शब्दाच्या निर्मितीतच हे सूचन आहे.उप म्हणजे जवळ आणि निषद म्हणजे बसणे. शिष्याने गुरुजवळ बसून करुन घ्यायचे आकलन ते उपनिषद.चारही वेदांचे सविस्तर विवेचन करणारी उपनिषदे यासाठीच महत्त्वाची आहेत.

यातील गूढ अशा ईशतत्त्वाचं सार ज्यात सामावलेलं आहे ते ‘ ईशोपनिषद ‘  या बंददरवाजाआडील गूढतत्त्वाची उकल करण्याचा मार्ग दाखवणारं आहे. शुक्ल यजुर्वेदाच्या वाजसनीय संहितेचा चाळीसावा अध्याय म्हणजे ईशोपनिषद. केवळ १८ मंत्र असणारं हे उपनिषद् तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे. कर्म आणि ज्ञान यांचा समन्वय हे याचे वैशिष्ट. पुढे भगवद्गीतेत आलेल्या निष्काम कर्मयोगाच्या मूलतत्त्वाचा पुरस्कार याच उपनिषदात सर्वप्रथम आलेला. उद्देश अर्थातच ईशप्राप्ती हाच. ईशप्राप्ती म्हणजेच स्वतःच्या आत्म्यात वास असणाऱ्या परमात्म्याला ओळखणं.हेच ब्रम्हज्ञान. हेच बंद दरवाजाआड लपलेलं गूढतत्त्व..!

सर्वसामान्यांना या कैवल्याच्या मार्गावर आणून सोडण्याचं काम करण्यासाठीच संतविभूती जन्माला आल्या आणि त्या मार्गाची स्वत:च्या आचरणाने आणि शिकवणूकीने ओळख करुन देऊन अंतर्धानही पावल्या.त्या गूढतत्त्वाच्या आकलनासाठी स्वतःची योग्यता सिद्ध करीत त्या दरवाजापर्यंत जाऊन पोहोचण्याचे तीन भिन्न मार्ग आहेत. तिन्ही मार्गांच्या दिशा वेगळ्या पण उद्दिष्ट एकच. ज्याला जो मार्ग रुचेल तो त्याने अनुसरावा.

कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे ते तीन मार्ग. तीनही अगदी भिन्न पण ज्ञानाच्या गावालाच जाणारे. तिनही मार्गांचे स्वरूप परस्पर भिन्न असल्याने पहाणाऱ्याच्या मनात कोणता मार्ग अनुसरावा याबाबत संभ्रम निर्माण होतो. तो दूर होण्यासाठी या प्रत्येक मार्गाचं स्वरुप समजावून घेऊन आपल्याला जे रुचेल, पटेल, शक्य होईल असे वाटेल तो मार्ग स्वीकारण्याचं स्वातंत्र्य ज्याचे त्याचे.

अतिशय कडक सोवळेओवळे, व्रतवैकल्ये, उपासतापास अशा कृत्त्यांनी ईश्वराचे आराधन करणाऱ्यांचा मार्ग तो कर्ममार्ग. या कर्म संबंधातले टोकाचे नीतिनियम अतिशय काटेकोर असल्याने हा मार्ग तसा अतिशय खडतर. या मार्गामधील तथ्य लक्षात न घेता त्याचं अंधानुकरण म्हणजे उद्दिष्ट विसरून फक्त कृतीलाच महत्त्व देणे. हे रुढ झालं की कर्ममार्गाचं रूपांतर कर्मकांडात होतं.तिथं फक्त कृतीलाच महत्त्व आणि मनातला भाव मात्र तितका उत्कट नसल्याने हे अंधानुकरण अर्थहीन असतं.पण म्हणून कर्ममार्गाला न्यूनत्त्व येऊ नये. या मार्गावरून मार्गक्रमण करून गूढतत्त्वापर्यंत पोचणारे श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, आणि त्याहीनंतरचे वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी ही प्रातिनिधिक उदाहरणे.

दुसरा भक्तिमार्ग. या मार्गावरून जाणाऱ्यांचे मन अतिशय शुद्ध असणे अपेक्षित. मन किंचितही जरी मलिन झाले तरी गूढतत्त्व पाऱ्यासारखे हातून निसटून जातेच.दया, प्रेम, सौजन्य अंगी असणे,श्रवण-पूजना बाबतची मनातली आस्था आणि ओढ अत्यावश्यक. परमतत्त्व मनोमन जाणून केलेले नामस्मरण. या सर्व अंगाने केलेली भक्तीच श्रीहरी प्राप्तीचा आनंद मिळवून देते.

तिसरा योगमार्ग. यासाठी बाहेरचे कांहीच लागत नाही. सर्वसामान्यांना जाणवत नाही पण जेवढे ब्रम्हांडी असते तेवढेच पिंडीही असतेच. ते घेऊनच योग साधायचा असतो. कुंभक, रेचक, इडापिंगळेचे भेद, धौती, मुद्रा, तारक, कुंडलिनी सुषुम्ना यांचे ज्ञान ही योग मार्गावरील प्रवासाची शिदोरी.

या तीनही मार्गांचे अंतिम फळ म्हणजेच बंददरवाजा पलीकडील गूढतत्त्वाची ज्ञानप्राप्ती. या तीनही मार्गावरील पांथस्थ एकाच मुक्कामावर पोहोचतात आणि तेव्हाच त्यांना संतपदही प्राप्त होते.  

आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांसाठी सत्प्रवृत्तीने आचरण करून कोणत्याही रूपात कां होईना गूढ अशा त्या इशतत्त्वाचे आस्तित्त्व श्रद्धायुक्त अंतःकरणाने मानणे हेच बंददरवाजापर्यंत पोचणाऱ्या मार्गाकडे जाणारे पहिले पाऊल असेल.

 

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! 99.99% विरुद्ध 100% !  ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? 99.99% विरुद्ध 100% !  ??

“नमस्कार पंत !”

“नमस्कार मोरू !”

“हा काकूंनी सांगितलेला तुमचा मोती साबण !”

“बर झालं, माझी खेप वाचली. बस, हिला चहा करायला सांगतो.  अग ए, ऐकलंस का, मोरू आलाय जरा …..”

“नको नको पंत, उशीर होईल, अजून चाळीतल्या बाकीच्यांच्या ऑर्डरचा माल पण पोचवायचा आहे.”

“पण काय रे मोरू, तुझ्या पिशवीत आमचा एकुलता एक मोती साबण आणि दोन म्हैसूर सँडल साबण सोडले, तर बाकीचे सगळे डेटॉल साबणच दिसतायत मला !”

“तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे पंत. यातला एक म्हैसूर सँडल जोशी काकांचा आणि दुसरा लेले काकांचा !”

“आणि बाकी चाळीतले सगळे लोकं यंदा दिवाळीला काय डेटॉल साबण लावून अभ्यँग स्नान करणार आहेत की काय ?”

“हो ना पंत, तुम्ही त्या डेटॉलवाल्यांची टीव्हीवरची जाहिरात नाही का बघितलीत ?”

“नाही बुवा, कसली जाहिरात ?”

“अहो पंत, सध्या त्या करोनाच्या विषाणूने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे आणि ते डेटॉलवाले जाहिरातीत म्हणतात की, आमचा साबण 99.99% विषाणू मारतो.”

“म्हणून सगळ्यांनी डेटॉल साबणाची ऑर्डर दिली की काय मोरू ?”

“हो ना पंत, मग मी तरी काय करणार ?  तुमची तीन घर सोडून, आणले सगळ्यांना डेटॉल साबण !”

“मोरू, अरे हे फसव्या जाहिरातीच युग आहे, हे कळत कसं नाही लोकांना ?”

“आता नाही कळत त्यांना, तर आपण काय करणार पंत ?”

“बरोबर, आपण काहीच करू शकत नाही. अरे तुला सांगतो आमचा राजेश एवढा हुशार, पण तो सुद्धा एकदा अशा जाहिरातबाजीला फसला होता म्हणजे बघ.”

“काय सांगता काय पंत ?”

“हो ना, अरे त्याच काय झालं दोन वर्षापूर्वी तो एका सेमिनारला जपानला गेला होता…..”

“बापरे, म्हणजे जपान मध्ये सुद्धा अशी फसवाफसवी चालते ?”

“नाही रे, थोडी चूक राजेशची पण होती.”

“म्हणजे काय पंत, मी नाही समजलो ?”

“अरे त्याच काय झालं, तिथे एका दुकानात त्याला एक पांढरा साबण दिसला, ज्याच्यावर लिहिल होत, ‘ऍलर्जी फ्री, कुठल्याही प्रकारचे विषाणू, जीवजंतू  100% मारतो !”

“मग काय केलं राजेशने, घेतला का तो साबण ?”

“हो ना, चक्क आपले सहाशे रुपये मोजून एक वडी घेतली पठयाने.”

“बापरे, सहाशे रुपयाची एक साबण वडी ? पंत, याच पैशात आपल्याकडे कमीत कमी 12 लक्स आले असते आणि वर्षभर तरी पुरले असते !”

“अरे खरी मजा पुढेच आहे, हॉटेल मधे येवून त्याने त्या साबणाचे रॅपर काढले तर काय, आत साबणाच्या आकाराची तुरटीची वडी, आता बोल ?”

“पंत, म्हणजे ते जापनीज लोकं साबण म्हणून तुरटी विकत होते ?”

“हो ना, पण त्यात त्या लोकांची काय चूक ? अरे तुरटीच्या अंगी जंतूनाशकाचा गुण अंगीभूतच असतो हे तुला माहित नाही का ?”

“हो माहित आहे पंत, आम्ही गावाला गढूळ पाणी शुद्ध करायला त्यात तुरटी फिरवायचो.”

“बरोबर, तर त्याच तुरटीचा त्यांनी साबण करून विकला तर त्यांची काय चूक ? अरे तुला सांगतो, आम्ही सुद्धा पूर्वी दाढी झाल्यावर तुरटीचा खडा फिरवायचो चेहऱ्यावर, तुमच्या या हल्लीच्या आफ्टरशेव लोशनचे चोचले कुठे होते तेंव्हा ?”

“पंत या जाहिरातीच्या युगात, काय खरं काय खोटं तेच कळेनास झालं आहे. बर आता निघतो बाकीचे लोकं पण वाट बघत….”

“जायच्या आधी मोरू मला एक सांग, चाळीतल्या इतर लोकांसारखा तू पण डेटॉल साबणच वापरणार आहेस का दिवाळीला ?”

“नाही पंत, ते डेटॉलवाले त्यांचा साबण 99.99% विषाणू मारतो असं सांगतात, पण मी या विषाणूवर माझ्यापुरता 100% जालीम उपाय शोधून काढला आहे!”

“असं, कोणता उपाय ?”

“अहो मी चाळीतली खोली भाड्याने देवून…..”

“अरे काय बोलतोयस काय मोरू, तुला कोणी चाळीत कसला त्रास दिला का ? तसं असेल तर मला सांग, मी बघतो एकेकाला.”

“नाही पंत, त्रास वगैरे काही नाही….”

“मग असा टोकाचा निर्णय का घेतलास आणि तुझी खोली भाड्याने देवून तू कुठे रहायला जाणार आहेस ?”

“आपल्या चाळीपासून जवळच असलेल्या संगम नगर मधे !”

“अरे काय बोलतोयस काय मोरू ? तिथे आमच्याकडे काम करणाऱ्या सखूबाई, जोश्याकडे काम करणाऱ्या पारूबाई राहतात आणि ती एक अनधिकृत वस्ती आहे तुला माहित …..”

“आहे पंत, ती एक अनधिकृत वस्ती आहे ते….”

“आणि तरी सुद्धा तुला तिथे रहायला जायचय ?”

“हो पंत, कारण सध्याच्या करोनाच्या काळात, मुंबईतल्या अशा वस्त्याच जास्त सेफ असल्याचा खात्रीलायक रिपोर्ट आला आहे ! त्यासाठीच मी माझ्या कुटूंबासकट हे करोनाचे संकट टळे पर्यंत संगम नगर मधे राहण्याचा निर्णय घेतला आहे.”

“धन्य, धन्य आहे तुझी मोरू !”

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

२५-१०-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आपापली खिडकी ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

⭐  आपापली खिडकी ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

आपापली खिडकी !

समजा आपण बसने कोठे प्रवासाला निघालो आहोत आणि बस स्टॉपवर जरा गर्दी दिसली, तर आपण असा विचार करतो की येणाऱ्या बस मध्ये आपल्याला नुसते जरी चढायला मिळाले तरी भरून पावलो ! कारण इच्छित स्थळी जायला आधीच उशीर झालेला असतो ! कधी कधी अशा गर्दीत, त्या बस मध्ये चढायला मिळाल्यावर त्यात comfortably उभे राहायला मिळाले तरी मग आपल्याला बरे वाटते ! हो की नाही ?

त्याच बस मध्ये इतर वेळी जर थोडी कमी गर्दी असेल आणि आपल्याला कुठेही नुसते बुड टेकायला मिळाले तर आपण लगेच खुश ! 

पण, एखाद्या प्रवासात जर तीच बस आपल्याला खूपच रिकामी मिळते,  तेंव्हा आपण  “खिडकी” ची जागा कुठे आहे का ते बघतो आणि तेथे  बसतो, खरं की नाही ? त्याशिवाय जर तुम्ही बसलेल्या खिडकीच्या बाजूला “ऊन” नसेल तर काय, सोन्याहून पिवळेच की !

आता अस बघा, वरील चारही प्रसंगात “आपण” तेच असतो, पण या चारही वेळेला आपण बस पकडतांना, वेगवेगळा विचार करतो ! तसेच त्या चारही प्रसंगी आपली “सुखाची” व्याख्या  परिस्थितीनुरूप बदलती असते !

प्रत्येकालाच आयुष्यात अशी एक सुखदायक “खिडकीची” जागा आवडत असते आणि ती तशी मिळवण्याचा प्रत्येक जण आपापल्या परिने प्रयत्न करीत असतो. त्यात काहीच चूक नाही.

आपले आयुष्य म्हणजे सुध्दा एक बस आहे, असं मला वाटतं ! त्या बस मध्ये प्रत्येकाला एक एक, पण निरनिराळी खिडकी तुमच्या नशिबात असेल तेंव्हा मिळावी, अशी सोय त्या विधात्याने केलेली आहे आणि त्यातून प्रत्येकाला दिसणारा जो वेगवेगळा नजारा आहे, तेच आपले आयुष्य आहे असे माझं प्रामाणिक मत आहे !

थोडक्यात काय, तर आपण सुद्धा आपल्या नशिबात जी “खिडकी” आली आहे किंवा येणार आहे त्यातच आनंद मानून, त्यातून दिसणारा जो नजारा आहे त्यातच सुख मानले, त्याचा आनंद घेत घेत जगण्याचा प्रयत्न केला, तर या जगात कोणीच दुःखी राहणार नाही, या बद्दल माझ्या मनांत तिळमात्र शंका नाही !

आपापल्या मनाची काळजी घ्या !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शिवशाहीर…… ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?  विविधा ?

☆ शिवशाहीर…… ☆ सौ राधिका भांडारकर 

babasaheb purandare felicitation ceremony: बाबासाहेब पुरंदरेंचा उद्या नागरी सत्कार; निमंत्रितांच्या यादीत 'या' दिग्गजांचा समावेश - shiv shahir babasaheb purandare turns 100 ...

? बाबासाहेब बळवंत मोरेश्वर पुरंदरे ?

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाची बातमी ऐकल्या नंतर ,वाचल्यानंतर मन जड झाले.एका ऐतिहासिक पर्वाचाच अस्त झाला.

संपूर्ण जीवनात त्यांचा एकच ध्यास होता, शिवचरीत्र घराघरात पोहचवायचे.शिवाजी राजाचे उत्तुंग व्यक्तीमत्व ,आणि त्याचे विवीध पैलु जाणीवपूर्वक अभ्यासून त्यांनी श्रोत्यांपुढे वाचकांपुढे मांडले…

वयाच्या शंभराव्या वर्षापर्यंत अखंड वाचन आणि अभ्यास त्यांनी उपासकाच्या भूमिकेतून केला.नवे अभ्यासक,,नवे इतिहासकार व्हावेत म्हणून ते तरुणांना प्रेरणा देत.मदत करत…

कथाकथन, व्याख्यान, नाटक, जाणता राजा हे महानाट्य, पुस्तकं, विवीध मालीकांसाठी संहीता लेखन, या माध्यमातून त्यांनी शिवचरित्र घराघरात नेलं.. सुलभ भाषाशैली, प्रभावी ओघवतं वक्तृत्व .. यामुळे सामान्य माणसाना शिवाजी राजा, त्यांचे कर्तुत्व, त्यांचे माणूसपण, त्यांचे राजेपण, नेतृत्व, देवत्व याचे आकलन झाले.

त्यांच्या मुखातून शिवचरीत्र ऐकताना श्रोते शिवमय होत.मंत्रमुग्ध होत.गेली सात दशके बाबासाहेबांनी हे अमृत प्रांतोप्रांती पाजले…

बळवंत मोरोपंत पुरंदरे हे त्यांचं मूळ नाव..

पण जनमानसात त्यांची ओळख बाबासाहेब पुरंदरे याच नावाने आहे..

वयाच्या आठव्या वर्षी वाढदिवसाची भेट म्हणून त्यांनी वडीलांकडे सिंहगड दाखवण्याचा हट्ट केलाहोता वडीलांनी तो पुराही केला होता..

शाळेत त्यांनी केलेलं भाषण ऐकून, शिक्षकांनी त्यांना छातीशी कवटाळलं.. म्हणाले.. “खूप मोठा होशील.. अभ्यास कर.. इतिहासाचे संस्कार जनात वाट…”

“शिवभक्ती ही आपल्याला संस्कारातून आणि रक्तातूनच मिळाली आहे ..”असे ते सांगत.

भारत सरकारने पद्मविभूषण हा किताब त्यांना बहाल केला. महाराष्ट्रभूषण म्हणूनही त्यांना गौरवण्यात आले. मात्र या दोन्ही सन्मानाच्या वेळी उलटसुलट विचारप्रवाह वाह्यले. बाबासाहेब मात्र तटस्थच राहिले. त्यांनी स्वत:ला कधी इतिहासकार असे बिरुद लावले नाही. ते अभ्यासक, उपासकाच्या भूमिकेतच वावरले… लोकांनी मात्र त्यांना शिवशाहीरच मानले.

महाराष्ट्रभूषण पुरस्काराच्या दहा लाख रकमेतील फक्त दहा पैसे त्यांनी स्वत:जवळ ठेवले आणि पदरचे घालून पंधरा लाखाची देणगी त्यांनी पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटलला  दिली.

गणगोतमधे पु.ल. देशपांडे त्यांच्याविषयी लिहीतात, “इतिहासाचा हा मोठा डोळस उपासक आहे. भक्त आहे. पण त्या भक्तीमार्गावर ज्ञानदीपाचा प्नकाश आहे. निराधार विधान करायचे नाही.ही प्रतिज्ञा आहे.लिहीताना अखंड सावधपण आहे..”

त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. बारीकसारीक तपशील त्यांच्या लक्षात रहात. अभ्यासात सातत्य होते. ते हाडाचे संशोधक होते. तेम्हणत “शास्त्रीय पद्धतीने लिहीलेलं लेखन अभ्यासकांपुरतं मर्यादित रहातं. मात्र रंजक पद्धतीचं लेखन सर्वसाधारण माणसांपर्यंत पोहचतं..”

सागर देशपांडे यांनी लिहीलेल्या बाबासाहेबांवरच्या बेलभंडार या पुस्तकात या संशोधकाची परिपूर्ण ओळख होते…

शंभराव्या वाढदिवसाच्या समारंभात ते म्हणाले होते, “मला जर १२५वर्षांचं आयुर्मान लाभलं तर मी शिवचरीत्र ब्रह्मांडाच्या पलीकडे घेऊन जाईन…”

त्यांच्याइतका लोकप्रिय संशोधक आजपर्यंत झाला नसेल.पानटपरीवरही आदराने त्यांचा फोटो कितीतरी जणांनी पाहिला असेल.तेही लोकांचा तितकाच आदर करत.लहान मुलांनाही ते अहो जाहो करत… असं हे थोर व्यक्तीमत्व..आज अनंतात लोपलं.

काळाच्या उदरांत विसावलं…

एक ध्यास पर्व संपलं…शिवभक्तीने तळपलेला हा महासूर्य अनंताच्या क्षितीजावर मावळला…

ऊरले आहेत ते चैतन्याचे, स्फुर्तीचे, प्रेरणेचे नारिंगी रंग…

अशा व्यक्तीमत्वापुढे  नतमस्तक होऊन आदरपूर्वक वाहिलेली ही श्रद्धांजली..!!??

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares