मराठी साहित्य – विविधा ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आई—!!! भाग 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

? विविधा ?

?‍⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स ?‍⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆

☆ आई—!!! भाग 1 ☆ 

(©️doctor for beggars )

एप्रिल चा पहिला आठवडा ! 

रस्त्यांवर लाॕकडाउन मुळे भयाण शांतता. नाही म्हणायला पोलीस जागोजागी… ! 

मी भिक्षेक-यांचा डाॕक्टर … माझं काम रस्त्यावरच !

लाॕकडाउन च्या काळात ज्यांना घरं होती, मग भले ती झोपडपट्टीत का असेनात, त्यांना घरी रहायला बजावुन सांगितलं…!  ज्यांना घरं नाहीत अशांना काॕर्पोरेशनने निर्माण केलेल्या निवारा केंद्रात पाठवुन दिलं. आता माझ्या भिक्षेकरी वर्गापैकी रस्त्यांवर कुणी नव्हतं. तरीही चुकुन कुणी सापडतंय का हे बघत मी रस्त्यांवरुन फिरत होतो. 

फिरता फिरता एका मंदिरापाशी आलो. मंदिराबाहेर शुकशुकाट. मंदिराची दारं बंद… ना भिक्षेकरी… ना भक्त !

—मी तिथुन निघणार तेव्हढ्यात भिक्षेकरी बसतात त्या ठिकाणी एक आजी बसलेली मला दुरुन दिसली. ही माझ्या ओळखीची नव्हती. कपडे ब-यापैकी नीटनेटके… ! 

भिक्षेकरी वाटत नव्हती…!  मग ही इथं का बसली असेल ? माझी उत्सुकता वाढली. मी जवळ गेलो… 

हा आता आपल्याला काहीतरी देणार या आशेनं तीनं आपसुक हात पुढे केला. 

मला आश्चर्य वाटलं… भिक्षेकरी तर वाटत नाही…मग हात का पुढे करावा हिने ? 

वय असेल साधारण 70-75 वर्षे. डोईवरचे सर्व केस पांढरे, डोळे खोल गेलेले, चेह-यावर सुरकुत्यांचं जाळं… हाताच्या बोटापर्यंत पसरलेलं… !  या जाळ्यात मध्येच लुकलुकणारे दोन डोळे, चेह-यावर अजीजी, करुण भाव … !

‘आजी इथं का बसलाय ?’ मी विचारलं. 

‘काही नाही, बसल्येय हो देवळाच्या दारात, आपण पोलीस आहात का?  बोलणं मृदु आणि स्वच्छ !

माझी खात्री झाली, आजी भिक्षेकरी नाही. 

तरीही तिला म्हटलं, “ देवळाच्या दारात बसलाय म्हणता, आणि इथं बसुन मागता. बरोबर ना ? मघाशी हात पुढं केलात, बघितलं ना मी…”

तिनं चमकुन माझ्याकडं पाहिलं, डोळ्यात पाणी तरारलं… पण बोलली काहीच नाही. 

“ उठा आजी असं उघड्यावर बसू नका, सध्या काय चालु आहे माहित आहे ना ? जा घरी…कुणी येणार नाही काही द्यायला “. मी पुन्हा बोललो. 

ती ओशाळली, म्हणाली, “ तसं नव्हे हो ! जाते मी इथुन …. कुणी येणार नाही काही द्यायला…काय करणार नशीबच फुटकं…! “—-मला या वाक्याचा अर्थ कळला नाही. 

ती उठली… जायला निघाली.— मनात नसतांनाही ती जायला उठली, पण तिला थांबायचं होतं अजून— माझ्याकडं तिनं ज्या केविलवाण्या नजरेनं पाहिलं त्यात मला ते स्पष्ट जाणवलं. 

मलाच वाईट वाटलं. म्हटलं, “आजी, मी डाॕक्टर आहे, काही औषधं लागत असतील तर सांगा, दुसरी काही मदत हवी असेल तर सांगा…!  पण कुणाला भीक मागायला लागू  नये यासाठी मी काम करतोय, शिवाय तुम्ही चांगल्या घरातल्या वाटताहात…आणि …”

ती चालता चालता थबकली, वळून हसत म्हणाली…” चांगलं घर , वाईट घर असं पण असतं का ?”

“ नाही तसं नव्हतं म्हणायचं मला…” मी काहीतरी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 

ती हसली; काहीतरी विचार करुन म्हणाली, “ केळी आहेत का तुमच्याकडे ? “

मला काही कळेचना, ब-यापैकी परिस्थिती वाटते, भिक्षेकरी तर वाटत नाही, तरी इथं मंदिरात काही मिळेल या आशेनं ती इथं बसली होती, हटकल्यावर निघाली, आता जातांना केळी मागते…! 

मानसिक रुग्ण असावी का ?—– उलगडा होईना. उत्सुकता अजुन चाळवली. 

मी तिच्या मागं गेलो, म्हणालो “ आजी… काय झालं… इकडे कुणाची वाट पहात होता का ? काही हवं होतं का… ? “ 

“ मला केळी द्याल…? ” पुन्हा तिनं भाबडेपणानं विचारलं.

मी डायरेक्ट मुद्द्यावर आलो, “ आजी झालंय काय ? नीट सांगाल, तर मी नक्की काहीतरी मदत करेन…! ” 

क्रमशः —-

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महात्मा ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?  विविधा ?

☆ महात्मा ☆ सौ राधिका भांडारकर  

राष्ट्रातील प्रत्येक घर ही शाळा आहे.आणि घरातील मातापिता हे शिक्षक आहेत.

 

ही पृथ्वी ,हवा, भूमी, पाणी,हे सर्व म्हणजे आपल्या बापजाद्यांनी वारसाहक्काने दिलेली मालमत्ता नव्हे,तर ते पुढील पिढ्यांसाठीची जोखीम आहे.ती किमान जशीच्या तशी त्यांच्या हाती सोपवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

तलवार ही शूराची निशाणी नाही तर ती भीतीची निशाणी आहे बलहीन व्यक्ती कुणाला ही क्षमा करु शकत नाही. बलवान माणूसच क्षमा करु शकतो.

 

जे लोक म्हणतात,धर्माचा राजकारणाशी संबंध नाही त्यांना धर्म काय हेच माहीत नाही.

 

असे आणि अशा तर्‍हेचे अनमोल विचार देणारे गांधीजी त्यांची आज जयंती.त्यानिमीत्ताने त्यांच्या बहुमोल विचारांचे चिंतन व्हावे ही अपेक्षा…

नेता याचा अर्थ मी असा समजते की जो समाजाला,सत्याच्या,न्यायाच्या ,नीतीच्या मार्गावर नेतो तो नेता.तो जाणता असला पाहिजे.निस्वार्थी असला पाहिजे.

समाजाची दु:ख,होरपळ या बाबतीत कृतीशील कनवाळु असला पाहिजे.त्याच्या कार्यावर त्याचा स्वत:चा विश्वास ,श्रद्धा,भक्ती आणि त्या प्रवाहात इतरांना आत्मविश्वासाने घेउन जाणारा हवा…

।।वैश्णव जन तो तेने कहिये जो पीड पराई जाणे रे।।

स्वातंत्र्यपूर्व काळातील गांधीजींची हीच प्रतिमा होती..

म्हणून ते लोकनेता ठरले.ते देशाचे बापू झाले. राष्ट्रपिता ठरले.

गांधीजींना महात्मा हे संबोधन दिलं गेलं कारण ,एक स्वतंत्र सेनानी, अहिंसेचा पुरस्कर्ता म्हणून त्यांचे संपूर्ण कार्य महान होते.त्यांनी त्यांचं आयुष्य देशाला समर्पित केलं होतं.ते खर्‍या अर्थाने लोकांप्रती,लोकांसाठी आणि लोकांतर्फेच होते.!

सत्य अहिंसा परमोधर्म…

ही त्यांची निष्ठा होती.जीवन सूत्री होती.न्यायासाठी त्यांनी अंदोलने केली. चंपारण्य अंदोलनाद्वारे,शेतकर्‍यांवर होणार्‍या अत्याचाराला वाचा फोडली.. ब्रिटीश जमीनदारांच्या विरोधात हडताळ केले. आणि त्यांना झुकण्यास भाग पाडले. “भारत छोडो” अंदोलनात,

‘करो या मरो’ असा घणाघाती नारा दिला. लोकांच्या जाणीवा पेटवल्या. गुलामगिरीचे जोखड फेकून देण्यासाठी प्रवृत्त केले.

जातीभेद,अस्पृष्यता वर्णद्वेष,यांच्या उच्चाटनासाठी ,त्यांनी त्यांचं जीवन समर्पीत केलं.

गोल चष्मा ,काठी ,चरखा आणि पंचा म्हणजे गांधींची प्रतिकात्मक छबी!

या उघड्या भारतीय नेत्यांने जगाला नमवलं..थक्क केलं..

मातृभूमीसाठी त्यांनी बलीदान केलं. भारतीयांच्या मनात ते राष्ट्रपती आणि बापू  म्हणूनच सदैव जागृतच असतील.

प्रख्यात शास्त्रज्ञ, आईनस्टाईनने, गांधीजींच्या बाबतीत असं म्हटलं आहे, की “असा कुणी माणूस या धरतीवर निर्माण झाला होता ,हेच एक महान आश्चर्य आहे,.”

गांधीवाद, गांधीजींची तत्व, त्यांचे जीवन, त्यांच्या निष्ठा, म्हणजे एक मोठा अभ्यासक्रम आहे. एक संस्कृती प्रणाली आहे.

बदलत्या काळानुसार उलटसुलट वैचारिक प्रवाह  वाहताना दिसतात.

आज गांधीजी असते तर…? पासून ते गांधीजींने हे करायला नको होतं… पर्यंत विचारधारा आहेत..

आजही जनयात्रा, रथयात्रा, आशिर्वाद यात्रा निघतात.

उपोषणं केली जातात.. अंदोलने होतात. धरणे धरली जातात. संप होतात.. केंद्रस्थानी गांधीजींचे उपोषण, गांधींची दांडीयात्रा ही शिकवण असेलही पण ती तळमळ ,ती तात्विकता ,समर्पण आहे का?….

गांधी हत्येचं समर्थनही केलं जातं

GREAT MEN COMMIT GREAT MISTAKE

असं कंसात म्हटलंही जातं.

पण माझ्या मते गांधी एक इतिहासाचं पान आहे…

एक संस्था आहे.

एक ग्रंथ आहे.

वेळोवेळी उघडावा, वाचावा, अभ्यासावा…

गांधीजींचे जीवन म्हणजे मूर्तीमंत गीता आहे!

झाले बहुत।होतील बहुत।

परी या सम हाच।।

या दिव्यत्वासमोर कर माझे आदरे जुळती….!!

दोन आॅक्टोबर. आज त्यांची जयंती .म्हणून

या तत्वाला भावपूर्ण आदरांजली!!

धन्यवाद!

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कार्यपट …. गदिमा ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?  विविधा ?

☆ कार्यपट …. गदिमा ☆ सौ राधिका भांडारकर  

०१  ऑक्टोबर हा माननीय गजानन दिगंबर माडगुळकर म्हणजेच गदिमा यांचा जन्मदिन..त्या निमीत्ताने मागे वळून पाहताना… गदिमा हे एक असाधारण व्यक्तीमत्व होते.दिग्गज कवी ,गीतरामायणकार,लेखक ही त्यांची ओळख तर आहेच,पण ते विख्यात पटकथा,संवाद लेखक होते.

Best Bhojpuri Video Song - Residence wघरच्या गरिबीमुळे,केवळ चरितार्थासाठी ते चित्रपट व्यवसायात आले. नवयुग चित्रपट संस्थेत,सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत असताना,चित्रकथा कशी तयार करायची हे त्यांनी जाणून घेतले.१९४७ साली त्यांनी राजकमल पिक्चर्सच्या ,लोकशाहीर रामजोशी या चित्रपटाची कथा, संवाद व गीते त्यांनी लिहीली.त्यात तायांनी एक भूमिका पण केली.आणि या चित्रपटाला ,प्रचंड लोकप्रियता मिळाली.आणि त्यानंतर,कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी ,गदिमा हे मराठी चित्रपट सृष्टीचा एक भक्कम आधार बनले, त्यांनी लिहीलेल्या आणि विशेष गाजलेल्या चित्रपटात, पुढचं पाऊल,बाळा जोजो रे,लाखाची गोष्ट,पेडगावचे शहाणे,ऊनपाऊस,मी *तुळस तुझ्या अंगणी,जगाच्या पाठीवर *संथ वाहते कृष्गामाई या चित्रपटांचा समावेश आहे. शिवाय तुफान और दिया,दो आँखे बारह हाथ,गूँज ऊठी शहनाई हे त्यांची पटकथा असलेले उल्लेखनीय हिंदी चित्रपटही अतिशय लोकप्रिय झाले..

त्यांच्या चित्रकथा वैविध्यपूर्ण असून ,संवाद सोपे आणि चपखल असत.

योगायोगानेच त्यादिवशी गदिमांची ,कथा,संवाद आणि गीते असलेला लाखाची गोष्ट हा चित्रपट पहायला मिळाला.कृष्गधवल ,काहीशी धूसरच प्रिंट असलेला चित्रपट पाहतानाही,मन गुंतून गेले.कदाचित ते त्यातल्या प्रभावी कथानका मुळेच असेल.अत्यंत आशयपूर्ण आणि समाजापुढे हसत खेळत,एक चांगला संदेश देणारी गदिमांची कथा ही या चित्रपटाच्या यशाची जमेची बाजू.

१९५२ साली हा चित्रपट प्रसारित झाला.आणि प्रचंड गाजला.आजच्या इतकं प्रगत चित्रपट तंत्र नसतानाही त्यांत मन रमतं,कारण गदिमांची प्रसन्न कथा.कालबाह्य न होणारी कथा.

चित्रा,रेखा,राजा गोसावी आणि राजा परांजपे अशी उत्तम कास्ट.मालती पांडे आणि आशा भोसले यांनी गायलेली मधुर गाणी. खरोखरच सर्वांगसुंदर चित्रपट.

श्याम आणि रामनाथ हे दोघं कलाकार मित्र.श्याम चित्रकार.रामनाथ कवी.कलाक्षेत्रात अजुन न बहरलेले .

त्यामुळे गरीबच.खोलीचं भाडंही भरण्यापुरते पैसे नाहीत.

रामनाथची प्रेयसी रेखा. ती गायिका.रेडिओ प्रसिद्धीमुळे, थोडंफार कमावणारी.तिची मैत्रीण सरोज,ही एका श्रीमंत बापाची मुलगी.आणि पोर्ट्रेट करण्याच्या निमीत्ताने ,एकमेकांच्या प्रेमात पडलेले ती आणि रामनाथ.

अशी ही कलाप्रेमी मित्रांची एकमेकांत गुंतलेली प्रेम कहाणी.कथेचा विस्तार होत असताना ,अनेक विनोदी घटना प्रेक्षकांना खळखळून हसवतात. सरोजच्या वडीलांचं

अवास्तव श्वानप्रेम,रेखाच्या वडीलांचची फाटक्या संसारातही, नाट्यवेड टिकवून ठेवण्याची अतोनात धडपड…शेवटी काय पैसा महत्वाचा..

त्याचवेळी सरोजचे वडील रामनाथला एक लाख रुपये देतात.व एक विचीत्रअट घालतात.हे एक लाख रुपये एक महिन्यात संपवून दाखवलेस तरच माझी मुलगी तुझ्याशी लग्न करेल.वरवर सोपी वाटणारी ही अट अमलात आणत असताना अनंत अडचणी येतात.

ते २५/३० दिवस रामनाथ आणि श्यामचे प्रचंड तणावात जातात.आणि श्यामला जाणवायला लागते की या पैशापायी आपण कलेपासून दूर जात आहोत.रंग ,कॅन्व्हासची आपली दुनिया दुरावत आहे.कला हाच आपल्या जीवनाचा आत्मा आहे.शेवटी तो पैसा,प्रीतीचा त्याग करतो.आणि पुन्हा कलेकडे वळतो.श्रीमंत बापाचं घर सोडून श्यामची प्रेयसी सरोज त्याच्याचकडे येउन तिचं त्याच्यावरचं,आणि त्याच्या कलेवरचं प्रेम सिद्ध करते.

अखेर सरोजचे वडील  लग्नास परवानगी देतात.कलेवरचं प्रेम हीच लाखाची गोष्ट ,याची जाणीव त्यांना होते…कथा आणि चित्रपट  एक चांगला संदेश देऊन सुखांतात संपतो.

चित्रपट कुठेही रेंगाळत नाही.कंटाळवाणा आजही वाटत नाही.तो हसवत राहतो.उत्सुकता वाढवतो,आणि चुटपुटही लावतो.यात गदिमांच्या अत्यंत सजीव ,चैतन्यमयी लेखनाचाच वाटा आहे.

शिवास “माझा होशील  ना..

“त्या  तिथे पलीकडे माझिया प्रियेचे झोपडे….”

“डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे…

ही अवीट गोडीची गदिमांची तरल गीते….

गदिमांची पटकथा असलेले चित्रपट गाजले ,ते त्यांच्या विचार देणार्‍या ,प्रभावी ,संवादात्मक कथानकामुळे….

अशा या महाराष्ट्राच्या वाल्मिकीला ,महान मराठी सारस्वताला माझा आदरपूर्वक प्रणाम…!!!

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अवघ्या आशा श्रीरामार्पण ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ अवघ्या आशा श्रीरामार्पण ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

Best Bhojpuri Video Song - Residence w‘गीतरामायण’ आणि कविवर्य ग. दि. माडगूळकर हे एक रत्नजडित समीकरण आहे. ही  ६६ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. गदिमा आणि आकाशवाणीचे अधिकारी सीताकांत लाड रोज प्रभातफेरीला जात असत. मराठी श्रोते आपल्या कुटुंबासह आनंद घेऊ शकतील असा वर्षभर चालणारा एक कार्यक्रम आकाशवाणीवर सादर करण्याची कल्पना लाडांनी एकेदिवशी मांडली.बऱ्याच कालावधी पासून गदिमांच्या मनात रामकथा घोळत होती.आकाशवाणी कार्यक्रमाबद्दल ऐकले त्याच वेळी गदिमांच्या मनात गीत रामायणाचे बीज रुजले आणि त्यातून ही दैवी रचना आकाराला आली.

त्यावेळी श्रीराम कथेने त्यांना जणू भारून टाकले होते. या भारलेल्या अवस्थेतच प्रासादिक शब्दरचना, प्रासादिक संगीत आणि प्रासादिक स्वर यांच्या त्रिवेणी संगमातून एक महाकाव्य जन्माला आले  ‘ गीत रामायण ‘. १एप्रिल १९५५ ची रामनवमी या दिवशी पुणे आकाशवाणी वरून पहिले गीत सादर झाले,

स्वये श्री रामप्रभू ऐकती

कुशलव रामायण गाती ||

एका दैवी निर्मितीची अशी ही सुरुवात झाली. रामनवमी १ एप्रिल १९५५ ते रामनवमी १९ एप्रिल १९५६  या काळात एकूण ५६ गीते सादर झाली.

प्रत्येक गीतातला रामकथेचा भाग  रामचरित्रातीलच एका व्यक्तीच्या तोंडून सांगितलेला आहे.  ही एक गीत शृंखलाच आहे. बऱ्याच गीतांमधील कथाभाग गीताच्या शेवटी पुढील प्रसंग किंवा पुढील गाण्याशी जोडलेला आहे.

मुळामध्ये ‘वाल्मिकी रामायण’ हे चिरंतन काव्य आहे. त्यातले अमृतकण गीत रामायणात देखील प्रकट झालेले आहेत. त्यामुळेच त्याला अध्यात्मिक अर्थ आणि श्रेष्ठत्व प्राप्त झालेले आहे. महर्षी वाल्मिकींनी उभ्या केलेल्या मंदिरात गदिमांनी श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या मराठमोळ्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. त्यामुळे गीतरामायण हे सर्वसामान्यांच्या देखील ‘मर्मबंधातली ठेव’ बनले आहे.

या रामकथेमधून मानवी प्रवृत्तीच्या विविध भावनांचे दर्शन होते. त्यामुळेच रामायणाच्या गीतांमधून सर्व रसांचा अनुभव आपल्याला येतो. रौद्र, कारुण्य, वात्सल्य, शौर्य, आनंद, असहाय्यता, त्वेष अशा सर्व भावनांचा यातून मिळणारा अनुभव थेट काळजाला भिडतो. या गीतांसाठी अतिशय चपखल अशी भावप्रधान, रसप्रधान  शब्दयोजना आणि गायकी वापरली गेल्याने या गीतातील भावनेशी आपण सहज एकरूप होतो.मनाला  भावविभोर करणारे संगीत आणि भक्तीच्या ओलाव्याने चिंब भिजलेले शब्दसामर्थ्य यांच्या मिलाफाने जनमानस अक्षरश: नादावून गेले.   

मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम म्हणजे आदर्शांची परिपूर्ती. रामकथेच्या अनेक घटनांनी उत्तम आदर्श प्रस्थापित केले आहेत. मनुष्याला दुराचारापासून परावृत्त करणे आणि पुढे दुराचाराविरुद्ध उभे करणे ही रामायणाची प्रेरणा आणि चिंतन आहे. गीतरामायणाचे मोठेपण हे आहे की, या प्रेरणेचे आणि चिंतनाचे प्रतिबिंब त्यात उमटले आहे.

मनुष्य हा परमेश्‍वराचा अंश आहे म्हणजे, मुख्य ज्योतीने चेतविलेली एक छोटी ज्योत आहे. त्याने परमेश्वरी शक्तीचे आरतीरूप गुणगान केले, तसे होण्याचा प्रयत्न केला तर ‘नराचा नारायण होणे’ अवघड नाही. हे सर्व सार गदिमा सहज एका ओळीच सांगून जातात ज्योतीने तेजाची आरती.

कमीत कमी शब्दात गहन अर्थ भरण्याची गदिमांची हातोटी विलक्षण अशीच आहे.

कित्येक गीतांच्या ओळी या सुभाषितवजाच आहेत. ‘

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ‘ 

हे  गीत याचा आदर्श नमुना आहे. श्रीरामांनी या गीतातून जीवनाचे सार आणि चिरंतन तत्वज्ञान साऱ्या मानवजातीसाठी सांगितलेले आहे. गदिमांच्या प्रतिभा संपन्नतेचा हा आविष्कार आपल्याला थक्क करणारा असाच आहे.

असे हे गीतरामायण गदिमा आणि सुधीर फडके यांच्या गीत आणि संगीत क्षेत्रातला शिरपेचच आहे. महाराष्ट्राला तर त्याने वेड लावलेच.पण त्याचबरोबरीने हिंदी, गुजराथी, कानडी, बंगाली, आसामी, तेलगू, मल्याळी, संस्कृत, कोकणीतही त्याचे भाषांतर झालेले आहे.  मूळ अर्थामध्ये किंचितही फरक नाही. विशेष म्हणजे सर्वत्र बाबूजींच्या चालीत ते गायले जाते.

सर्व मानवी मूल्यांचा आदर्श असणारा ‘श्रीराम’ जनमानसाच्या गाभाऱ्यात अढळपदी विराजमान आहे. ही गीते आकाशवाणीवरून सादर होत असताना लोक रेडिओला हार घालून धूपदीप लावून अत्यंत श्रद्धाभावाने गीत ऐकत असत. असाच अनुभव दूरदर्शन वरून ‘रामायण’ सादर होतानाही आला. आत्ताच्या लॉक-डाऊनच्या काळात पुन्हा ‘रामायण’ प्रक्षेपित केले गेले तेव्हाही नव्या पिढीने अतिशय आस्थेने त्याला प्रतिसाद दिला. नवीन कलाकार अतिशय श्रद्धेने गीतरामायण सादर करतात आणि जागोजागी या कार्यक्रमांना मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून जनमानसावर रामकथेची मोहिनी अजूनही तशीच आहे याचे प्रत्यंतर येते. रामकथा ऐकल्यावर मन अननुभूत अशा तृप्तीने, समाधानाने भरून जाते. ” अवघ्या आशा श्रीरामार्पण ” याची अनुभूती येते.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दैवजात दुःखे भरता…. ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ दैवजात दुःखे भरता ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे 

Best Bhojpuri Video Song - Residence wप्रख्यात कवी, पटकथा, संवाद व लेखक म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ते सर्वांचे लाडके ग.दि.मा.. गजानन दिगंबर माडगूळकर यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 मध्ये शेटफळ येथे त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे बालपण अतिशय गरीब व प्रतिकूल परिस्थितीत गेले. वयाच्या सोळाव्या, सतराव्या वर्षी त्यांनी मराठी साहित्यीक क्षेत्रात प्रवेश केला आणि बघता बघता सम्राट पद प्राप्त केले. कथाकार, पटकथाकार, संवाद लेखन, गीतकार अभिनेता, निर्माता या सर्वच क्षेत्रात  त्यांचा वावर होता. त्यांनी 157 पटकथा लिहिल्या आणि 2000 पेक्षा जास्त गाणी लिहिली.

माडगूळ येथे बामणाचा पत्रा तेथे त्यांनी बरेच लेखन केले. त्यांच्या जोगिया, मंतरलेले दिवस ,चैत्रवन या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली.

1969 मध्ये “पद्मश्री”किताब देऊन त्यांना गौरविले गेले. 1971 मध्ये यवतमाळ मध्ये भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद यांनी भूषवले.

त्यांनी अनेक प्रकारचे लेखन केले असले तरी ते कवी च होते., त्यांना शब्दाची अडचण भासली नाही. त्यांच्या काव्य रचनेला दाद मिळाली. पण गीत रामायण या  काव्याने किर्तीचा कळस गाठला आणि “आधुनिक वाल्मिकी”म्हणून त्यांचीनवीन ओळख झाली. वाल्मीकि रामायणात  वाल्मिकींनी 28000 श्लोकात राम कथा लिहिली. याच श्लोकावरून माडगूळकरांनी राम कथा ५६  गीतात शब्दबद्ध केली. गीत रामायणाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच कवीने वर्षभर रचले ,एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केले आणि हाच गीत रामायण  कार्यक्रम पुणे आकाशवाणी  केंद्रावर वर्षभर चालला. गीत रामायणातील बरीच गीते ८-१०-१२-१४-१६ कडव्यांची आहेत. सर्वच गाणी सुंदर आहेत पण”पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा”हे गीत मला  विशेष आवडते. ह्या गीतात अयोध्येत परत येण्यासाठी आग्रह करणाऱ्या भरताचे राम सांत्वन करतात व त्याला जीवनाचे सत्य उलगडून सांगतात. थोडक्यात मानवी जीवनाचे सार  या गीतात सांगितले आहे.

दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

माय कैकयी ना दोषी नव्हे दोषी तात

राज्यत्याग कानन यात्रा सर्व कर्मजात

खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दुःखेयेतात, बऱ्याच वेळा मुलाला आपल्या मनाप्रमाणे शिक्षण घेता येत नाही तेव्हा त्यात आई-वडिलांचा दोष असतो असे नाही.  प्रत्येकाच्या नशिबात जे घडणार असते तसेच घडते .आपल्यावर  अन्याय झाला तरी मर्यादा न सोडता संयमाने वागले पाहिजे ही शिकवण मिळते.

जरा मरण यातून सुटला कोण प्राणीजात?

प्रत्येकाला बाल्यावस्था, तरुण अवस्था आणि वृद्धावस्था येणार आणि शेवटी मरण हे अटळ आहे., जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कोणाची सुटका होत नाही. त्यासाठी दुःख करण्यात काहीच अर्थ नाही. आलेल्या परिस्थितीत हतबल न होता धैर्याने सामोरे गेले पाहिजे.

दोन ओंडकयांची होते सागरात भेट

एक लाट तोडी त्यांना पुन्हा नाही भेट

क्षणिक तोचि आहे बाळा  मेळ माणसाचा

सागरात दोन ओंडकयांची भेट होते पण पाण्याच्या प्रवाहाने त्यांच्या दिशा बदलू शकतात. आजच्या जीवनात असेच घडत असते ना! मनुष्य आयुष्य जगत असताना अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. कधी आयुष्याच्या एखाद्या टप्प्यात काही लोकं भेटतात, काही दिवस, काही वर्ष आपल्या सहवासात राहतात पण काही कारणाने दुरावतात, दूर जातात ,भूतकाळात जातात माणसं मौल्यवान असतात जोपर्यंत ती सहवासात आहेत तोपर्यंत त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला, त्यांना फोन करा, त्यांना भेटा.

नको आग्रहाने मजसी परतवूस व्यर्थ

पितृवचन पाळून दोघे होऊ दे कृतार्थ

माणसाने आपण दिलेल्या वचनाप्रमाणे त्याची पूर्तता करून आयुष्य जगले पाहिजे.

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आण्णांची सुंदर बालकविता ☆ श्री सुभाष कवडे

?  विविधा ?

☆ आण्णांची सुंदर बालकविता ☆ श्री सुभाष कवडे

Best Bhojpuri Video Song - Residence wमराठी वाङ्मयात आपल्या अभिजात काव्य प्रतिभेने स्वत:ची ‘सुवर्णमुद्रा’ निर्माण करणारे, माणदेशाचे ‘सुवर्णरत्न’ म्हणजे, स्व.ग.दि.माडगूळकर(आण्णा) होत. आण्णा म्हणजे दुष्काळाने होरपळणाऱ्या माणदेशाची श्रीमंती होय. बहुमुखी प्रतिभेच्या आण्णांचा जन्म माणदेशातील आटपाडी तालुक्यातील ‘शेटफळे’ या छोट्या खेड्यात झाला आहे. माडगुळे आणि शेटफळे ही दोन छोटी गावे मराठी माणसाच्या मनामनात कुतूहलाचा आणि आदराचा विषय बनली आहेत. ते गदिमा आण्णांच्या आणि व्यंकटेश माडगूळकर तात्यांमुळेच. गदिमा, तात्या आणि शंकरराव खरात यांच्यामुळे माणदेशी माती धान्य झाली आहे .

    आण्णांवर काव्यलेखनाचे संस्कार अगदी लहानपणापासून त्यांच्या मातोश्रीकडून झाले आहेत. ओव्या,भजने,लोकगीते,पोवाडे,भारुडे आदी प्रकारच्या लोकगीतांचा खजिना त्यांना माणदेशातूनच विपुल प्रमाणात ऐकावयास मिळाला. ज्या मातीतून गदिमा जन्मले त्या मातीचे संस्कार घेऊनच ते मोठे झाले. लिहिते झाले. कोणताही कलावंत आपल्या मातीचे संस्कार घेऊनच मोठा होत असतो. आण्णांची लेखणी निर्मळ झऱ्याप्रमाणे होती. मनाला दिलासा देणारी होती. समाजमनावर संस्कार आणि मूल्यांची पेरणी करणारी होती. आण्णांच्या मनात माणदेशातील भोळ्याभाबड्या वारकऱ्यांबद्दल अपार श्रद्धा होती. म्हणूनच आण्णा संत कवी वाटतात. जगण्याचे तत्त्वज्ञान साध्या-सोप्या भाषेत सांगणारे तत्त्वचिंतक वाटतात. अत्यंत साधे-सोपे शब्द, सरलता, प्रासाद, अर्थपूर्णता ही आण्णांच्या लेखणीची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे आण्णांची कविता मातीत राबणाऱ्या अशिक्षित बळीराजालासुद्धा भावते. अण्णांची कविता म्हणजे, मानदेशी मातीचे ‘अक्षरलेणे’ आहे. आण्णांना आपल्या काव्यलेखनाचा अभिमान होता. पण गर्व मुळीच नव्हता. फुटपाथवर झोपलेल्या,उदबत्त्या विकलेले, शिकवण्या केलेले,आडत्याच्या दुकानात कामावर राहिलेले आण्णा आपल्या अलौकिक प्रतिभेने रसिकांच्या हृदयसिंहासनावर आज आरूढ झाले आहेत. महाराष्ट्राला पसा-पसा भरून ‘शब्दधन’ दिले आहे. व्यक्तीचित्रे, कथा, कादंबऱ्या, नाटके, पटकथा आणि हजारो गाणी लिहिणारे आण्णा उत्कृष्ट अभिनेते होते. अण्णांनी गाण्यांमध्ये विविध प्रकार हाताळले आहेत.   अभंग,कविता,भावगीते,भक्तिगीते, पोवाडे,लावण्या,गवळणी,स्फूर्तीगीते, अंगाईगीते असे विविध प्रकार हाताळले आहेत.याबरोबरीने गदिमांनी सर्वांगसुंदर अशी बालगीतेसुद्धा लिहिली आहेत. चांदण्यात चुळभरा, तळ्याकाठचे नंदी, चक्रपाणी,पोपटाची गोष्ट अशा काही सुंदर संस्कारक्षम बालकथा लिहल्या आहेत. आण्णांची ‘बालगीते’ म्हणजे आण्णानी ‘मूल’ होऊन लिहिलेल्या कविता आहेत. अतिशय निष्पाप मनाने आण्णांनी लेखणी लिहिती केली आहे. चिमुकल्यांचा भाबडेपणा, निष्पापपणा, भावविश्व सारं काही बाळाचं आहे. मुलांचं म्हणून एक जग असतं आणि या बाळजगताचा अभ्यास करुन बालकविता लिहिल्या आहेत.

‘बिनभिंतीची शाळा’ नावाची आण्णांची सुंदर कविता आहे. चार भिंतीतल्या शिक्षणाइतकेच निसर्गाचे शिक्षणही मुलांना आवश्यक आहे. हे निसर्गशिक्षण शिकवणारी ही कविता आहे. निसर्गातील प्राणी, पक्षी, फुलपाखरे,तारे,वारे,चांदण्या, प्रत्येकजण आपल्याला काहीतरी शिकवीत असतात म्हणून हे सारे आपले गुरू आहेत. असा उदात्त विचार मांडणारी ही कविता आहे.

बिनभिंतीची उघडी शाळा 

लाखो इथले गुरू 

झाडे वेली पशू-पाखरे 

यांशी गोष्टी करू…..

या ओळी मुलांना शाळेबाहेरच्या ज्ञान देणाऱ्या या गुरूंचा परिचय करून देणाऱ्या आहेत. ‘कुरूप बदक’ अशीच एक आण्णांची सुंदर कविता आहे. एकटेपणाची जाणीव होता-होता जीवनाचे वास्तव समजल्यावर स्वतःचे अस्तित्व गळून जाते. यासाठी स्वपरिचय महत्त्वाचा आहे. असे मूल्य सांगणारी ही कविता मनाला चटका लावून जाते. आभाळ, सूर्य,चंद्र, चांदण्या याबद्दल मुलांना सदैव कुतूहल आणि आकर्षण वाटत आले आहे. या घरात जाण्यासाठी निळी वाट आहे, असं सांगणारी अण्णांची ‘देवाचे घर’ नावाची एक सुंदर बालकविता…. बाळाबरोबर मोठ्यांनाही आनंद देणारी आहे. या कवितेत लिहितात. याबरोबरीने गदिमांनी सर्वांगसुंदर अशी बालगीतेसुद्धा लिहिली आहेत.चांदण्यात चुळभरा, तळ्याकाठचे नंदी, चक्रपाणी,पोपटाची गोष्ट अशा काही सुंदर संस्कारक्षम बालकथा लिहल्या आहेत. आण्णांची बालगीते म्हणजे आण्णानी मूल होऊन लिहिलेल्या कविता आहेत अतिशय निष्पाप मनाने आण्णांनी लेखणी लिहिती केली आहे. चिमुकल्यांचा भाबडेपणा निष्पापपणा भावविश्व सारं काही बाळाचं आहे. मुलांचं म्हणून एक जग असतं आणि या बाळजगताचा अभ्यास करुन बाल कविता लिहिल्या आहेत. 

बिनभिंतीची शाळा नावाची आण्णांची सुंदर कविता आहे.चार भिंतीतल्या शिक्षणाइतकेच निसर्गाचे शिक्षणही मुलांना आवश्यक आहे.हे निसर्ग शिक्षण शिकवणारी ही कविता आहे निसर्गातील प्राणी,पक्षी,फुलपाखरे,तारे,वारे,चंद्र, चांदण्या,प्रत्येकजण आपल्याला काहीतरी शिकवीत असतात.म्हणून हे सारे आपले गुरू आहेत. असा उदात्त विचार मांडणारी ही कविता आहे.

बिन-भिंतीची उघडी शाळा 

लाखो इथले गुरू 

झाडे वेली पशु पाखरे 

यांशी मैत्री करू…

 अण्णांची ‘देवाचे घर’ नावाची एक सुंदर बालकविता बाळाबरोबर मोठ्यांनाही आनंद देणारी आहे. या कवितेत लिहितात .

निळी निळी वाट

 निळे निळे घाट 

निळ्या निळ्या पाण्याचे 

झुळझुळ पाट…..

 ‘लयबद्धता’ आणि ‘देखणी शब्दकळा’ यामुळे सारेजण ही कविता गुणगुणत राहतात. आणखी एक सुंदर बालकविता म्हणजे……

‘नाच रे मोरा’. पावसाळी वातावरण जिवंत करणारी, सातरंगी इंद्रधनुष्याच्या कमानीखाली मोराने नाचणे…. ही कल्पनाच आपल्या मनात मोरपंखी सातरंगी इंद्रधनुष्य निर्माण करणारी आहे.

पावसाची रिमझिम थांबली रे..

तुझी माझी जोडी जमली रे..

आकाशात छान-छान

सातरंगी कमान 

कमानीखाली त्या नाच,

नाच रे मोरा, आंब्याच्या बनात,

नाच रे मोरा नाच…..

‘गोरी गोरी पान’ हे गीत असेच फुलासारखे छान आहे. ‘चांदोबाची गाडी,’ गाडीला जुंपलेली  हरणाची जोडी, ही कल्पनाच किती मजेशीर व अफलातून आहे  आण्णा शब्दप्रभू होते. अलौकिक प्रतिभेचे वरदान लाभलेले महाकवी होते. त्यांची साक्ष ही कविता देते. मुलांसाठी सोपे लिहिणं अवघड असतं पण ते लिहीत होते.

 वहिनीला आणायला चांदोबाची गाडी

 चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी

 हरणाची जोडी तुडवी गुलाबाचे रान 

 दादा मला एक वहिनी आण…..

बालसुलभ कल्पना असावी तर अशी. हे फक्त गदिमांना शक्य झाले आहे. फुगडी खेळू गं फिरकीची,बकुळीचं झाड झरलं गं, अशांसारख्या अनेक गीतांचा उल्लेख करता येईल. ‘निज माझ्या पाडसा’ हे गदिमांनी लिहलेल प्रसिद्ध अंगाईगीत आहे. उत्तम निसर्गचित्रण या अंगाईगीतांमधून अनुभवता येते.

मिटून पापण्या पहा लाडक्या, स्वप्नामधली घरे ,

निळ्या धुक्यांच्या इमारतींना बर्फाची गोपुरे.

महाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधाप्रमाणे शिरलेल्या गदिमांच्या कवितांमध्ये त्यांनी लिहिलेल्या गीतांना एक वेगळे स्थान आहे. गदिमांनी शब्दमळा फुलवला. शब्दांची श्रीमंती पेरली. पाण्याविना भगाटा सोसणाऱ्या मातीला आपल्या शब्दांनी ओलावा दिला. म्हणूनच त्यांच्या सर्व साहित्यकृतींना आपण सारे अभिमानाने मिरवत आहोत. आण्णांच्या हृदयात सदैव एक निष्पाप मुल वास करत होते. म्हणून आण्णांनी चिमुकल्यांसाठी त्यांचे भावविश्व समृद्ध करण्यासाठी सुंदर संस्कारक्षम बालगीते लिहिली आहेत. ही बालगीते मराठी मनाला चिरंतन , चिरकाळ आनंद देत राहतील,  यात शंकाच नाहीत.

©  श्री सुभाष कवडे

भिलवडी जि.सांगली

भ्रमण -९६६५२२१८२२

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ३० सप्टेंबर : जागतिक अनुवाद दिन ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  विविधा ?

☆ ३० सप्टेंबर : जागतिक अनुवाद दिन ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

३० सप्टेंबर : जागतिक अनुवाद दिन

दोन संस्कृतींची जोडतो नाळ – सीमेपार घडवतो संवाद… अनुवाद

या अतिशय उचित व्याख्येनुसार ‘अनुवाद’ हे काम अतिशय उत्तमपणे करणा-या सर्व अनुवादकांना सर्वप्रथम मन:पूर्वक नमस्कार. 

‘लेखन’ ही जशी ‘कला’ आहे, तशीच ‘अनुवाद करणे’ ही सुद्धा नक्कीच कला आहे. ‘अनुवाद म्हणजे भाषांतर’, असे ढोबळपणे मानले जाते—-आणि भाषांतर म्हणजे एका भाषेतल्या शब्दांसाठी दुस-या भाषेतले शब्द शोधून वाक्य लिहिणे इतकेच, असा सर्वसाधारण मोठा गैरसमज असलेला दिसतो. ‘अनुवाद’ या शब्दाला मात्र जरा जास्त पैलू आहेत. 

भाषा कुठलीही असली, तरी त्यातून व्यक्त केल्या जाणा-या भावनांची आणि विचारांची विविधता, समृद्धता आणि ताकद, आपल्या मातृभाषेइतकीच प्रभावी असते… मनाला भिडणारी असते. म्हणूनच, आपल्या भाषेव्यतिरिक्त, इतर भाषांमधून प्रकट होणारे तितकेच मौल्यवान विचारधन आपल्यापर्यंतही पोहोचावे, यासाठी त्याचा आपल्या भाषेत अनुवाद करण्याचा विचार  ज्यांनी सर्वप्रथम केला असेल, त्यांचे खूपच आभार मानायला हवेत.

वेगवेगळ्या संस्कृती जपणा-या वेगवेगळ्या वंशातल्या माणसांचा जीवनाकडे बघण्याचा नैसर्गिकपणे वेगवेगळा असणारा दृष्टीकोन, एकाच गोष्टीबद्दल वेगवेगळ्या माणसांचा असणारा वेगवेगळा विचार, आणि अशा विचारांवर त्या माणसांच्या संस्कृतीचा, भोवतालच्या परिस्थितीचा, त्यांच्या जगण्याच्या पद्धतीचा, नक्कीच होणारा खोलवर परिणाम—- या सगळ्यांमुळे वेगवेगळ्या भाषा असणा-या वेगवेगळ्या देशातले किंवा अगदी एकाच देशातल्या वेगवेगळ्या प्रांतातले साहित्यही खचितच वेगवेगळे असते—-लेखनशैलीतही वैविध्य असते. भाव-भावनांच्या छटाही वेगवेगळ्या असतात. जगभरातल्या अशा प्रचंड आणि वैविध्यपूर्ण साहित्याचा रसास्वाद घेणे साध्य व्हावे, यासाठी ” अनुवाद ” हा एकमेव सर्वोत्तम मार्ग आहे. 

अशा वेगवेगळ्या भाषेतले, वाचकाच्या थेट मनाला भिडणारे समृद्ध साहित्य तितक्याच उत्तमपणे अनुवादित करतांना, अनुवादकाची भाषाही मूळ साहित्यिकाइतकीच समृद्ध, आणि तशीच थेट मनाला भिडणारी असणे अतिशय आवश्यक असते—-आणि म्हणूनच अनुवाद करतांना, फक्त मूळ शब्दाला अनुवादाच्या भाषेतला पर्यायी शब्द शोधला की झाले… असे कधीच करून चालत नाही. फक्त इंग्लिश भाषेबद्दल बोलायचे झाले, तर ‘गुगल-सर्च’ करून, किंवा डिक्शनरीत पाहून आपल्या भाषेत असलेले पर्यायी शब्द कुणालाही सहजपणे सापडू शकतात. पण एकाच इंग्लिश शब्दाचे मराठीत दोन अगदी वेगळे, आणि कधी कधी विरूद्ध अर्थही सापडू शकतात. आणि हे लक्षात घेता कुणालाही अनुवादाचे काम अगदी सहज जमेल, असे म्हणताच येत नाही. याचे मुख्य कारण असे की, उत्तम अनुवादकाला— ‘‘To be able to read between the lines” हे एक वेगळे आणि विशेष कौशल्य अवगत असणे अतिशय गरजेचे असते.  कारण असे की, कोणत्याही लेखकाला, आपल्या विचारांना जसेच्या तसे, अगदी नेमके असे शब्दरूप देणे कितीदा तरी शक्य होत नाही. स्वत:चे विचार आणि भावना पोहोचवण्यासाठी भारंभार शब्द वापरतांना, मूळ विचाराची, भावनेची भरकट होणे, लिखाणात विस्कळीतपणा येणे स्वाभाविकपणे घडू शकते, जे त्याला आवर्जून टाळावे लागते. म्हणूनच त्याच्या दृष्टीने त्याच्या भाषेतला जास्तीत जास्त नेमका शब्द तो वापरतो. पण अनुवादकाच्या भाषेतल्या पर्यायी शब्दात त्या भावना नेमकेपणाने व्यक्त होतीलच असं नाही, आणि असे कितीदा तरी होऊ शकते. आणि म्हणूनच, अनुवादकाला ‘‘to read between the lines’’ ही त्याची खास क्षमता वापरून, मूळ लेखकाच्या भावना आणि विचार जसेच्या तसे पोहोचवण्याची मोठीच जबाबदारी पेलावी लागते… ” अनुवाद या संकल्पनेमागचे हे मूळ तत्त्व आहे “, याचे भान सतत ठेवण्याची जबाबदारी आणि खबरदारीही अनुवादकाला जागरूकपणे घ्यावी लागते. —-विशेषत: वेगवेगळ्या भाषेतल्या वाक्प्रचारांचा अनुवाद करताना तर जरा जास्तच. म्हणूनच अनुवादित साहित्य आपल्याच भाषेत असल्याने ते वाचायला-समजायला सोपे जात असले, तरी कुणीही याचा अर्थ असा घेऊ नये की, अनुवाद करणे हे सोपे काम आहे. अनुवादित साहित्याचा रसास्वाद घेतांना, मूळ लेखकाइतकेच श्रेय अनुवादकाचे असते, हे वाचकांनी नक्कीच लक्षात घ्यायला हवे. इतर अनेक भाषांमधील साहित्य, अनुवादाच्या माध्यमातून जणू नव्याने निर्मिले जात असते. म्हणूनच जुन्या जाणत्या विचारवंतांनी…‘‘अनुवाद म्हणजे अनुसृजन किंवा अनुनिर्मिती”… ही जी व्याख्या केलेली आहे, ती खरोखरच अतिशय सार्थ आहे.            

आणखी विशेषत्त्वाने सांगण्याची गोष्ट अशी की, आता अनुवाद फक्त ललित साहित्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. आता अनेक शास्त्रीय विषय, अनेक प्रकारची संशोधने यांची विस्तृत माहिती देणारी, बहुपदरी मनोव्यापार विषद करून सांगणारी, वेगवेगळ्या आजारांवर वेगेवेगळ्या देशांमध्ये होणाऱ्या  ‘निदान आणि उपचार’ या संदर्भातल्या संशोधनांची माहिती देणारी, प्रत्येकाला स्वत:चा व्यक्तित्त्व-विकास साधण्यासाठी उपयुक्त ठरणारी… अशी असंख्य विषयांवरची पुस्तकं जगभरात लिहिली जात असतात. आणि आजपर्यंत अशा अनेक पुस्तकांचे इतर अनेक भाषांमध्ये अनुवाद केले गेले आहेत… केले जात आहेत… त्यामुळेच मूळ साहित्याइतकेच अनुवादित साहित्याचे दालनही दिवसेंदिवस अधिकाधिक समृद्ध होत चाललेले स्पष्ट दिसते आहे… म्हणूनच ‘अनुवादित साहित्य’ हा साहित्य क्षेत्रात जागतिक पातळीवर सन्मानित असलेला विशेष साहित्य प्रकार’ आहे, असे आवर्जून म्हणायला हवे. जगभरातल्या साहित्यसंपदेत मोलाची भर घालणारी… साहित्यविश्वाला मिळालेली ही खरोखरच एक मौल्यवान देणगी आहे, हे मान्य करावेच लागेल. 

म्हणूनच जगभरातल्या सर्व उत्तम अनुवादकांना आजच्या ‘जागतिक अनुवाद-दिना’च्या निमित्ताने पुन्हा एकदा मन:पूर्वक नमस्कार आणि तितकेच मन:पूर्वक धन्यवादही. 

 

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -4 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -4 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(चरैवेति  चरैवेति)

[नागपूर येथून प्रसिद्ध होणा-या ‘राष्ट्रसेविका’ या अंकासाठी  सौ.पुष्पा प्रभू देसाई यांच्या भारतीय रेल्वेवरील लेखाची निवड झाली आहे. तो आपल्या वाचनासाठी चार भागात देत आहोत.]

भारतीय रेल्वेची भूमिका काय वर्णावी ! भारतीय रेल्वे देशाच्या आर्थिक, सामाजिक, विकासात अग्रेसर आहे. कला, इतिहास ,साहित्य, रहाणीमान, यावर तिचा अदभुत प्रभाव पडला आहे. वेगवेगळ्या प्रांतातील विविधतेत एकता येत असल्याने, ती राष्ट्रीय अखंडतेचे प्रतिक मानायला काय हरकत आहे? दिवसाकाठी अब्जावधी लोक, सर्वात किफायतशीर अशा रेल्वेचा प्रवासासाठी उपयोग करतात. मला आठवतं १९६९–७०च्या सुमारास मिरज– विश्रामबाग आमचा  कॉलेजचा प्रवास तीन महिन्याच्या पासला चार रुपये असा होता .किती स्वस्त ना! मालवाहतूक ,कोळसा, खते ,शेती उत्पादने, पोलाद, खनिजतेल, इतकंच काय दुष्काळी भागात, पाणीसुद्धा पोचविण्यासाठी रेल्वे हा उत्तम पर्याय आहे .शिवाय रेल्वे चा ७0 टक्के महसूल हा मालवाहतूक मिळतो .प्रवासी वाहतूकीतूनही  बऱ्यापैकी उत्पन्न मिळते. अगदी साधी गोष्ट प्रवाशांनी तिकिटे रद्द केल्याने सुद्धा (२०१७ ते २०२०) रेल्वेला ९६ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. अलीकडेच पुणे विभागाने फुकटे प्रवासी पकडून आठ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे .उत्पन्नवाढीसाठी आता रेल्वेने संरक्षक भिंती, पूल, ओव्हर ब्रिज, यावर आता खाजगी जाहिराती लावायला सुरुवात केली आहे या इतक्या प्रचंड पसार्याचे व्यवस्थापन करताना रेल्वेलाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ए. सी. फस्ट क्लास, आणि विमान प्रवास यांच्या तिकिटात फारसा फरक नसल्याने कमी वेळेत पोचण्यासाठी प्रवासी विमान प्रवास  पसंत करतात . झुरळ, उंदीर ,घुशी, प्रवाशांनी केलेली अस्वच्छता यावरही बराच खर्च करावा लागतो. सध्या गणेशोत्सवामुळे चाकरमान्यांसाठी कोकणात जाण्यासाठी २२७  फेऱ्या (कोकण रेल्वेच्या) करण्याची मोदींनी तयारी दर्शविली आहे. जी मोदी एक्सप्रेस म्हणून धावत आहे. तसेच ‘ग्रीनफिल्ड,’ एक्सप्रेसचे सर्वेक्षण चालू आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग ती  सहा तासात पोचेल. त्यासाठी  ७०,०००कोटी खर्चाची योजना आहे .अखंड प्रगती चालूच आहे .सी लिंक रोड, प्रमाणेच चार पूल बांधून ,रेल्वे  मार्ग  बांधण्याचा विचारही चालू आहे. त्यासाठी ७५००० कोटी खर्च अपेक्षित आहे. दिवसेंदिवस रेल्वेचा विकास आणि प्रगती चालूच आहे. यापूर्वीचे रेल्वे मंत्री पियूष गोयल यानी उत्तम काम केले आहे. तसेच आताही अश्विनी वैष्णवसारखी अत्यंत कर्तबगार हुशार व्यक्ती रेल्वे मंत्री म्हणून काम करीत आहेत. जयप्रकाश व्यास युनिव्हर्सिटीमधून इंजिनीयर होऊन आय. आय .टी. कानपुरहून ते एम टेक झाले. पेन सिलवानिया मधून एम बी ए झाले.  आज ते एक मोठे आणि जबाबदारीचे पद यशस्वीरित्या भूषवित आहेत.

  अशा या झुक झुक गाडी कडे पाहिलं की मला तिची अनेक रूप दिसतात. लुटू-लुटू रांगते, अशी गोंडस  नँरोगेज गाडी. गुडू गुडू चालते ,अशी पॅसेंजर गाडी. जोरात जोरात धावते ,अशी एक्सप्रेस गाडी.  वायू सम तुफान पळते,अशी सुपरफास्ट गाडी. ताठ्यात, तोर्यात, झोकात चालते, ती वातानुकूलित गाडी. किती वर्णन करावीत तिची!. कवी वसंत बापटनाही शब्द सुचले, “दख्खनच्या राणीच्या बसून कुशीत, शेकडो पिलेही  चालली खुषीत”.किती छान!पूर्वी आतुरतेने वाट पहात असताना घरी येणारी पत्र ही रेल्वेच आणून देत होती ना ! प्रत्येक माणसाच्या आयुष्याच्या प्रवासात, जसे अनेक लोक येत असतात .जात असतात .तसाच काहीसा हा रेल्वेचा प्रवास, समांतर रुळावरून चालणारा! सुरुवातीच्या स्टेशन पासूनचा प्रवास करताना, काही मधेच उतरून जातात .काहीजण बराच काळ सहज सोबत करतात. एखादा दोन-तीन स्टेशन पर्यंतच, पण स्मृतीत राहावी अशीच सोबत करतो. एखादा नोकरीसाठी जाणारा तरुण , एखादा मिलिटरी तला जवान, माहेर सोडून सासरी जाणारी नववधू, कोणी बारशाला ,कोणी लग्नाला, कोणी ट्रीपला ,अशा अनेक भावभावनांचे मिश्रण असलेल्यांना, स्वतःसह घेऊन जाणारी ही रेल्वे प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते. आवडते. आपुलकीची वाटते. तिचं किती कौतुक करावं बरं ! इंग्रजांनी बीजारोपण केलेलं रेल्वेचे रोपट, आज त्याचा अभिमान वाटावा असा सुंदर डेरेदार वृक्ष झाला आहे. अजूनही तो वाढतोच आहे. वाढतोच आहे. भारताची महान समृद्धी म्हणून मिरवतो आहे . चरैवेति चरैवेति.

 समाप्त

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(चरैवेति  चरैवेति)

[नागपूर येथून प्रसिद्ध होणा-या ‘राष्ट्रसेविका’ या अंकासाठी  सौ.पुष्पा प्रभू देसाई यांच्या भारतीय रेल्वेवरील लेखाची निवड झाली आहे. तो आपल्या वाचनासाठी चार भागात देत आहोत.]

भारतीय रेल्वेची मालकी, रेल्वे मंत्रालयाद्वारे भारत सरकारकडे आहे. सोळा विभागांनी शिवाय भारतीय रेल्वेचे सहा उत्पादन केंद्राचे अधिकारीही , रेल्वे बोर्डाला जबाबदार असतात .  रेल्वेचे अंदाज पत्रक दर वर्षी वाढतच आहे .आधुनिकीकरण आणि विकास करण्याचा त्यात प्रस्ताव असतो .प्रवासी आणि मालवाहतुकीचे भाडे ठरविण्यात येते. तसेच लोकसभेत साध्या बहुमताने संमत असावे लागते. रेल्वेलाही लेखा परीक्षेचे नियम लागू असतात. महसुली खर्च भांडवली तुटवडा भारत सरकार भरून काढते. किंवा इंडियन रेल्वे फायनान्स कडून उसने घेतले जातात. २०२० सालचे ७० हजार कोटींचे अंदाजपत्रक आहे. त्यामध्ये अत्यंत उपयुक्त अशा अनेक तरतुदी आहेत.

रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूच्या मोकळ्या जागा सौर ऊर्जा निर्मितीसाठी वापरल्या जातील. दीडशे प्रवासी गाड्या प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर देण्याचा विचार असून प्रमुख पर्यटन स्थळे, तेजस सारख्या गाड्यांनी जोडण्याची योजना आहे. परदेशी प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सेवा सुविधांसह प्रवास उपलब्ध करून देण्याची योजना आहे. चोऱ्या आणि आतंकी हमला पासून सुरक्षिततेसाठी स्टेशन मध्ये क्लोज सर्किट कॅमेरे बसवले आहेत. घर बसल्या मोबाईल वर आपण तिकीट काढू शकतो. सर्व डब्यांमध्ये जैव शौचालये आहेत. गाडीतच जेवण मागविता येते. फलाटावर आपला डबा कोठे येणार ,याची बिनचूक माहिती कळू लागली आहे. कोकण रेल्वेने सुरक्षेसाठी, जगातील पहिलेच उपकरण विकसित केले आहे. हे उपकरण सिग्नलिंग प्रणाली आणि इंटरलॉकिंग प्रणालीशी जोडले गेल्यामुळे दुर्घटना कमी झाल्या. नॉर्थ ईस्ट  फ्रांटियर  रेल्वे मधे हे उपकरण यशस्वीरित्या काम करत आहे. मोठमोठ्या मेट्रो सिटी मध्ये, आता मेट्रो धावायला लागली आहे . २००२ला दिल्ली मेट्रो ट्रेन सुरू झाली. भारतातील  प्रख्यात सिव्हिल इंजिनियर श्रीधरन  १९९५ ते  २०१२ पर्यंत दिल्ली मेट्रोचे  निदेशक होते. ते भारताचे मेट्रोमॅन ठरले. त्यांचा पद्म आणि पद्मविभूषण देऊन सत्कार केला .मुंबई ,गुरुग्राम, हैदराबाद, कोची ,लखनऊ अनेक ठिकाणी, मेट्रोचा लाभ लोक घेत आहेत. कमीत कमी खर्चात जास्त सुविधा, आरामदायी ,आणि सुरक्षितता, तसेच रस्त्यांवरील गर्दीही कमी झाली .आज  १६ लाख कर्मचारी भारतीय रेल्वेत काम करतात. त्यामुळे रोजगारही वाढला .दर दिवशी ,१४000 गाड्या धावतात. पण तरीही प्रवाशांची मागणी पूर्ण होत नाही .सण, उत्सवांच्या वेळी आरक्षण मिळत नाही. आज महिलांना ही रोजगार मिळायला लागला आहे .कौतुकाची गोष्ट म्हणजे आशियातील पहिली महिला इंजिन ड्रायव्हर सुरेखा यादव ,सिव्हिल सर्विस मधील रेल्वे सुरक्षा अधिकारी सुचिता चटर्जी, पहिली सहाय्यक स्टेशन मास्तर रिंकू सिन्हा राँय या उत्तम काम करीत आहेत.

भारतीय रेल्वेचा पसारा सांगायचा तर ,अरे बापरे केवढा अवाढव्य! भारतीय रेल्वे ही भारताची खूप मोठी समृद्धी आहे. भारतातील रेल्वेचे नेटवर्क, अशियात प्रथम क्रमांकाचे आणि जगात दुसऱ्या क्रमांकाचे आहे.ही सर्वात मोठी सरकारी संस्था आहे.६५०००पेक्षा जास्त इंजिन्स, डबे, वाघिणी, कार्यरत आहेत. ५५०००कि.मि.ब्राँडगेज(७५  ) ८०००कि.मि.मिटरगेज(२१ 

आणि साधारण २५००कि.मि. नँरोगेज असा हा पसारा आहे. नँरोगेज मुख्यतः डोंगरी भागात चालतात.भारतीयांनी अभिमानाने आणि ताठ मानेने सांगाव्यात अशा रेल्वेच्या आणखीही काही गोष्टी सांगता येतील. दार्जीलिंग हिमालयीन रेल्वे मार्गावरील ,’धूम’ हे ठिकाण २१३४मि.उंच आहे. मुंबईचे जी. एस .टी .स्थानक, निलगिरी पर्वत  रांगां मधून जाणारी निलगिरी माउंटन रेल्वे, यांनी आज युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळविले आहे. जम्मू कश्मीर  — बारामुल्ला दरम्यानचा ‘पीर पंजाल ‘बोगदा,(११कि.मि.) भारतातील सर्वात मोठा बोगदा आहे त्याचप्रमाणे सर्वात मोठे रेल्वे मार्ग म्हणजे कन्याकुमारी ते जम्मू तावी पुढे ती बारामुल्ला पर्यंत (३७४५कि मि.) ,विवेक एक्स्प्रेस दिब्रुगड ते कन्याकुमारी (४२३३ कि.मि.) तिरुअनंतपुरम ते सिलचर(३९३२ कि.मि.) तिरूनेलवे्ल्ली ते जम्मू(३६३१कि.मि )  सर्वात मोठा फलाट खरगपूर (२७३३ फूट). सर्वात व्यस्त स्टेशन लखनौ. सिक्कीम आणि मेघालय येथे रेल्वेचे जाळे नाही. फेअरी क्वीन हे जगातील सर्वात जुने(  १८५५ मधले )  अजून चालू आहे. आणखी अभिमानाने सांगता येईल अशी गोष्ट म्हणजे चेन्नई येथील कोच फॅक्टरी(i, c, f,)  ही जगातील सर्वात मोठी   कोच  निर्माण करणारी, फॅक्टरी आहे एप्रिल २०१८ पासून फेब्रुवारी२०१९ पर्यंत या कंपनीने, २९१९ कोच तयार केले. याच कंपनीने देशातील पहिली हायस्पीड रेल्वे,” वंदे भारत एक्सप्रेस ” सुरू केली. ती नवी दिल्ली ते वाराणसी  मार्गावर

धावते. या कंपनीने शंभर कोटी मध्ये  ती  तयार केली .ज्याला बाहेर दोनशे ते तीनशे कोटी खर्च आला असता. या गाडीने एक वर्षात, चार लाख किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करून ,शंभर कोटी उत्पन्न मिळविले .इतकंच काय  पण श्रीलंकेलाही (D.E.M.U)   डिझेल मल्टिपल युनिट्स ट्रेन निर्यात केली आहे. तसेच (E.M.U)इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट रेल्वे तयार केली आहे.अशी पहिलीच गाडी ,ज्याचे पंखे आणि लाईट ,सौर उर्जेवर चालतील. छतावर सोलर पॅनेल बसविलेले आहेत. रेल्वे बाबत आणखी एक मजेशीर गोष्ट सांगायची म्हणजे देशातील जवळ जवळ पंधरा हजार रेल्वे गाड्यांद्वारे कापले जाणारे अंतर, पृथ्वी आणि चंद्रामधील  अंतराच्या साडेतीन पट आहे.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(चरैवेति  चरैवेति)

[नागपूर येथून प्रसिद्ध होणा-या ‘राष्ट्रसेविका’ या अंकासाठी  सौ.पुष्पा प्रभू देसाई यांच्या भारतीय रेल्वेवरील लेखाची निवड झाली आहे. तो आपल्या वाचनासाठी चार भागात देत आहोत.]

भारतीय रेल्वेच्या उत्पादन संस्था केंद्रीय मंत्रालयाच्या अखत्यारित येतात१) डिझेल  लोकोमोटिव  कार्यशाळा.,–वाराणसी., २)चित्तरंजन  लोकोमोटिव कार्यशाळा–चित्तरंजन. ३) डिझेल लोको  अधुनिक कार्यशाळा–पतियाळा. ४)इंटिग्रल कोच फँक्टरी–चेन्नई. ५)रेल कोच फँक्टरी कपूरथळा.  ६)रेल व्हील फँक्टरी बंगळुरू.  ७)रेल स्प्रिंग  कारखाना — ग्वाल्हेर.

रेल्वेची  प्रशिक्षण केंद्रेही  अनेक  ठिकाणी  आहेत. १) इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग– जमालपुर. २)रेल्वे स्टाफ कॉलेज –बडोदा। ३) इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल इंजीनियरिंग अंड हेवी कम्युनिकेशन — सिकंदराबाद.  ४)इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग –पुणे। ५)इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग –नासिक. सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टीम ही रेल्वे बोर्डाच्या नियंत्रणाखालील स्वतंत्र संस्था आहे. ती भारतीय रेल्वेसाठी संगणक प्रणालीचा विकास करते.

रेल्वे गाड्यांचे ही किती प्रकार सांगावेत१)उपनगरीय. २) एम.एम.यू. ३)डी. एम.यू.– डिझेल मल्टिपल युनिट. ४)डोंगरी. ५) पॅसेंजर  ६) एक्सप्रेस  ७)अतीजलद  ८) वातानुकूलित. ९) वातानुकुलीत सुपरफास्ट. १०) जनशताब्दी ११) शताब्दी. १२) संपर्क क्रांती. १३) गरीब रथ  १४) राजधानी. १५) दूरांतो. १६) दुमजली १७) अंत्योदय.  १८) उदय.  १९) तेजस .  २०) हमसफर . तसेच पॅलेस ऑन व्हील्स  ही विशेष गाडी राजस्थान सरकारने पर्यटन वाढवण्यासाठी सुरू केली भारत-पाकिस्तान दरम्यान समझोता एक्सप्रेस सुरू केली होती, पण आता की सुरू नाही. अपघाताच्या ठिकाणी लाईफ लाईन एक्सप्रेस काम करते. पुणे–नाशिक हाय स्पीड ला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे . मुंबई-दिल्ली मालगाडी साठी वेगळा मार्ग टाकणे चालू आहे. मुंबई– अहमदाबाद बुलेट ट्रेन चे काम चालू आहे. श्रीरामचंद्रांच्या स्थळांची तीर्थयात्रा करण्यासाठी, भारतीय रेल्वे “रामायण एक्सप्रेस ” सुरू करत आहे . सोळा रात्री आणि सोळा दिवस, प्रवास (१६०६५रु,.भाडे.).ए.सी.साठी (२६७७५ रु.). रेल्वेच्या वारसा यादीत अग्रणी असणाऱ्या आणि ९० वर्षे जुन्या असलेल्या, डेक्कन क्वीनचे मध्य रेल्वे आता रूप पालटणार आहे. जर्मन तंत्रज्ञान आधारित डबे, विशेष सुरक्षा व्यवस्था, आकर्षक बाह्यरूप, आरामदायी प्रवास, विशेष लोगो अशा सुधारणा आहेत.

भारतीय रेल्वेने प्रवाशांना गरजेप्रमाणे निरनिराळ्या वर्गांचे डबे केले आहेत.आरक्षित, द्वितीय, प्रथमवर्ग, खुर्चीयान, वातानुकूलित खुर्चीयांन, प्रथम आणि द्वितीय शयनयान, वगैरे. जोड मार्गिका वापरून, डबे एकमेकांना जोडले गेल्यामुळे, प्रवासी आतल्या आत एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाऊ शकतात.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares