मराठी साहित्य – विविधा ☆ बुध्दीबळ शास्त्र आणि ज्योतिष शास्त्र ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? विविधा ?

☆ बुध्दीबळ शास्त्र आणि ज्योतिष शास्त्र ⚜️ ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

मंडळी नमस्कार, ?

 

बुद्धीच्या देवतेचा सध्या उत्सव सुरु आहे. कुठलाही कलाकार मग तो गायक, अभिनेता, नर्तक, वादक, चित्रकार ,लेखक,कवी असू  दे

वर्षातील एकदा तरी आपली कला कलेची देवता श्री गजानना चरणी सादर करावी हे सर्वच कलाकारांना मनोमन सांगणे.  गणेशोत्सव ही या सगळ्यांसाठी विशेष पर्वणी.

 

याच उद्देशाने माझ्या बुध्दीच्या कुवती नुसार लिहिलेला  हा लेख बाप्पाला अर्पण  ?

 

तर मंडळी, लहानपणा पासून असलेली  बुध्दीबळाची आवड आणि वयाच्या एका टप्प्यावर लागलेली ज्योतिष विषयाची गोडी आणि आज या दोन्ही क्षेत्रातले बेसिक नाॅलेज यावरून या दोन्ही गोष्टींची तुलना, काही समान धागे जोडण्याचा केलेला हा प्रयत्न

 

पटावरील ६४ घरांमधे रंगणारे दोघांमधील युध्द आणि पत्रिकेतील १२ भावांमधे असणा-या जन्मकालीन ग्रहांशी गोचरीने होणारे ग्रहयोग ( नियतीने टाकलेले डाव ) हे माझ्यासाठी  कायमच उत्सुकतेचे विषय राहतील

पटांवरील प्रत्येक सोंगटी आणि पत्रिकेतील प्रमुख ग्रह यांची मी अशी बरोबरी केली आहे

 

रवी – राजा ??

आत्म्याचा कारक ग्रह – रवी

पटावर ज्याच्या साठी खेळ रंगतो  तो राजा

दोघांनाही चेक बसला, सोडवता नाही आला तर खेळ खल्लास

 

मंगळ / वझीर ?

मंगळाला सेनापती म्हणले आहे, वझीर हा पटावरचा खरा सेनापती

 

शनी / घोडा ?

अडीच + अडीच + अडीच = शनीची साडेसाती आणि घोड्याची पटावरील अडीच घरांची चाल.

कधी कुणाला … ? ( असो)

सळो की पळो करुन सोडेल,  गर्व हरण करेल सांगता यायचे नाही

 

हत्ती / गुरु ? ?

पटावर  राजा पासून सगळ्यात लांब असणारा,  अगदी सरळ मार्गी असणारा,   पण वेळोवेळी राजाला मार्गदर्शन करणारा हत्ती , आणि पत्रिकेतील गुरु सारखेच

 

कॅसलीन रूपाने  राजाची हत्तीशी  होणारी सल्लामसलत, मार्गदर्शन आणि वेळप्रसंगी गरज लागलीच तर मैदानात उतरणारा हत्ती म्हणजे पटाला लाभलेले गुरुबळच.

 

दोन उंट – बुध/ शुक्र ???

हे दोन्ही ग्रह अशुभ ग्रहात येत नाहीत पण अनेक वेळा यांची पत्रिकेतील स्थिती जपून अभ्यासावी लागते. वक्री, स्तंभी, उच्च-निच्च ग्रह केंव्हा तिरपी चाल चालवून धोक्याची घंटा वाजवतील हे सांगणे अवघड

 

प्यादी / चंद्र ?♟️

संख्येने जास्त असणारी प्यादी,  आणि  पत्रिकेत विविध कला दाखवणारा चंद्र यात कमालीचे साम्य आहे. राशी, नक्षत्र,  दशा, प्रश्णकुंडलीतील चंद्राचा भाग, इतर ग्रहांशी जमणारी केमिस्ट्री याबरोबरच मनाचा कारक ग्रह चंद्र

 

मूर्ती लहान पण कीर्ती महान. याच मनाच्या खंबीरतेवर प्रतिस्पर्ध्याच्या पहिल्या घरात पोचून प्यादाचा वजीर बनू शकतो जे इतर कुणालाही शक्य नाही.

इतर सोंगट्यांना सगळ्यात जास्त सपोर्ट हे प्यादे देते. धारातीर्थी ही पहिल्यांदा तेच पडते तर वजीर बनून पोर्णीमा ही अनुभवते

 

मंडळी , कशी वाटली तुलना?  आयुष्यात बुध्दीबळाचे अनेक डाव तुम्ही खेळता कधी जिंकता कधी हरता. पण पत्रिकेत ग्रहांचा जन्मत: सुरु झालेला डाव तुमच्या अंतापर्यंत सुरु राहतो. त्यात काही लढाया नियती तुम्हाला जिंकवते  काही  डावपेचात हरवते. इथे नियतीच फक्त  खेळत असते, आपल्यासाठी..

 

लेखनाचा शेवट भाऊसाहेब पाटणकरांची एक गझल थोडीशी बदलून

 

क्षणाक्षणाला रचती डाव

खेळ असे हे रंगलेले

शौर्य-बुध्दीचे प्रारब्ध त्यांच्या

पट-पत्रिकेवर दिसलेले

कधी असते खेळलेले

कधी असते ठरलेले

 

मोरया ??

अमोल

१२/०९/२१

भाद्रपद. शु षष्ठी।

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शिवाजी सावंत स्मृतीदिन विशेष – मृत्युंजयकार ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ शिवाजी सावंत स्मृतीदिन विशेष – मृत्युंजयकार ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

मराठीतील आपल्या पहिल्याच पौराणिक कादंबरीने इतिहास घडविणारे सुप्रसिद्ध कादंबरीकार म्हणजे शिवाजीराव सावंत. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गावी ३१ ऑगस्ट १९४० ला त्यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवाजीरावांचे शालेय शिक्षण गावातच झाले. ते उत्कृष्ट कबड्डीपटू होते. महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून ते कोल्हापूरात नोकरीला लागले.

कोल्हापूरच्या राजाराम प्रशालेत काही वर्षे अध्यापनाचे काम केले. तेथून पुण्यात येऊन महाराष्ट्र शासनाच्या ‘ लोकशिक्षण ‘ मासिकाचे सुरवातीला सहसंपादक आणि नंतर संपादक म्हणून काम पाहिले.

भारतीय जीवन आणि संस्कृती याबद्दल त्यांना सुरुवातीपासून सार्थ अभिमान होता. ‘ माझा भारत म्हणजेच महाभारत’, हे समीकरण एकदा मनात रुजल्यावर अभ्यासूवृत्तीने त्यांनी महाभारताचा सखोल व्यासंग सुरू केला.या अभ्यासातून अस्मिता विसरू पहात असलेल्या समाजपुरुषाला सूर्यपुत्र, ‘ मृत्युंजय ‘ कर्ण आपत्तीतही धैर्यशाली आणि तेजस्वी बनवेल असे उत्तर त्यांना मिळाले. मग प्रदीर्घ संदर्भशोधन, सखोल व उलटसुलट चिंतन-मनन आणि डोळसपणे टिपलेले निरीक्षण यातूनच रससंपन्न अशा प्रदीर्घ कादंबरीचा जन्म झाला . मृत्युंजयच्या लिखाणासाठी त्यांनी थेट कुरूक्षेत्रात मुक्काम ठोकला होता. अत्यंत सत्प्रवृत्त,समर्पणशील, स्वाभिमानी अशा कर्णाच्या व्यक्तिमत्त्वाची तितकीच गौरवास्पद प्रकाशमय बाजू या कादंबरीत मांडली आहे.

‘मृत्युंजय ‘ही १९६७ साली लिहिलेली त्यांची पहिलीच कादंबरी.या कादंबरीला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्या नावाला प्रसिद्धी मिळाली आणि ‘ मृत्युंजयकार ‘ हीच ओळख कायम झाली.

कादंबऱ्यात मानदंड ठरलेल्या या कादंबरीला अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले. १९८६ साली कलकत्त्याच्या ‘ विवेक संस्थान ‘ या बंगाली वाचकांच्या संस्थेने ‘ पूनमचंद भुतोडिया ‘ हा सर्जनशील साहित्याचा पुरस्कार देऊन सन्मान केला. दिल्लीतील भारतीय ज्ञानपीठ या संस्थेने १९९५ सालचा बारावा ‘ मूर्तिदेवी पुरस्कार ‘भारताचे उपराष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते देऊन सावंतांना सन्मानित केले.हा अत्यंत मानाचा पुरस्कार मिळवणारे सावंत हे एकमेव मराठी साहित्यिक आहेत.

‘ मृत्युंजय ‘ च्या एकतिस आवृत्त्या निघाल्या. हिंदी, कन्नड, गुजराथी, मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे.इंग्लिशमधील भाषांतराने मूळ मराठी कर्णगाथा आंतरराष्ट्रीय साहित्यात समाविष्ट झाली. तिच्या गुजराथी भाषांतराला ‘गुजराथ साहित्य अकादमी’ पुरस्कार आणि पुढे ‘केंद्रीय साहित्य अकादमी’ पुरस्कारही प्रदान करण्यात आला.

सावंतांनी कादंबरी, चरित्रलेखन, व्यक्तिचित्रे, ललित निबंध असे विविध प्रकारचे कसदार लेखन केले.

सावंतांची छत्रपती संभाजीराजांच्या जीवनावर लिहिलेली ‘ छावा’ ही कादंबरी पण खूपच वाचकप्रिय ठरली.तिचाही हिंदी अनुवाद प्रसिद्ध झाला.ही कादंबरी पण महाराष्ट्र राज्य पुरस्काराची मानकरी ठरली.

सावंतांनी लिहिलेले ‘मृत्युंजय’ नाटक चंद्रलेखा या नाट्यसंस्थेने रंगभूमीवर पुरे एक तप सादर केले. तसेच ‘ छावा’ हे नाटकही त्यांनीच सादर केले.दोन्हीही नाटके खूपच रसिकप्रिय होती.

भारतीय समाजमनातीला एक आदर्श व्यक्तिमत्व असणाऱ्या योगयोगेश्वर श्रीकृष्णाच्या चरित्रग्रंथावर ‘ युगंधर ‘ ही कादंबरी त्यांनी सिद्ध केली.या कादंबरीचाही हिंदी अनुवाद प्रकाशित झाला.

भव्योदात्त जीवनाबद्दल त्यांना वाटणारा आदर आणि ओढ मृत्युंजय, युगंधर,छावा या पुस्तकातून उत्कटतेने प्रकट होते. शब्दब्रह्माचे वरदान लाभलेल्या त्यांच्या लेखणीतून अत्यंत ओजस्वी शब्द सुमनांनी ही व्यक्तिमत्त्वे साकारताना हिऱ्याला जणू सुवर्ण कोंदणच लाभले.

त्यांनी लिहिलेली पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांची ‘ लढत ‘ ही चरित्र कहाणी, भाई मनोहर कोतवाल यांची ‘ संघर्ष ‘ ही चरित्र कहाणी आणि माननीय पी. के. अण्णा पाटील यांच्यावरील ‘पुरुषोत्तम नामा ‘ ही चरित्र कहाणी प्रकाशित झालेली आहे.

‘अशी मने असे नमुने ‘, ‘मोरावळा’ ही व्यक्तीचित्रे प्रसिद्ध आहेत. १९८३ साली ते बडोदा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

असा हा सिद्धहस्त लेखक दि.१८सप्टेंबर २००२ ला आकस्मिकपणे आपल्यातून निघून गेला. तरीही त्यांच्या अजरामर कलाकृतीतून ते सदैव साहित्य दरबारात वास करणार आहेत. त्यांना विनम्र अभिवादन. ?

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शिवाजी सावंत स्मृतीदिन विशेष – स्मरण मृत्युंजयकारांचे…. ☆ श्री आनंदहरी

❤️ जीवनरंग ❤️

☆ शिवाजी सावंत स्मृतीदिन विशेष – स्मरण मृत्युंजयकारांचे…. ☆ श्री आनंदहरी ☆

आपल्या शब्दसाहित्याने मृत्युवर जय मिळवलेल्या , अजरामर झालेल्या,मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांचा आज स्मृतीदिन . 

जीवनातील काही आठवणी या अमिट असतात. त्यातही बालपणातील, शालेय जीवनातील काही आठवणी तर आपण काळीज-कोंदणात जपून ठेवत असतो.. अशीच एक आठवण मृत्युंजयकार यांना पाहिल्याची, भेटल्याची आणि ऐकल्याची.

१९७२-७३ चे शैक्षणिक वर्ष. न्यू इंग्लिश स्कुल ,पेठ मध्ये आठव्या इयत्तेत शिकत होतो. शालेय वय हे संस्कारक्षम वय.. ओल्या मातीला हवातसा आकार देण्याचे वय.. आणि म्हणूनच असेल शाळेमध्ये विविध कारणांनी साहित्यिक, कलाकार यांना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी बोलावण्याची परंपरा शाळेने जोपासलेली. त्या परंपरेनुसार शाळेत मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांना निमंत्रित केलेले. ते त्यावेळी राजाराम हायस्कुल, कोल्हापूर येथे शिक्षक होते. मृत्युंजय कादंबरी प्रचंड गाजलेली होती, गाजत होती पण तरीही ते पेठ सारख्या ग्रामीण भागातील शाळेत आलेले.

त्यावेळी जे.के.दैव हे इतिहासाचे शिक्षक होते.साहित्य, नाटक यांची प्रचंड आवड असणारे.. रसिक वाचक म्हणून मृत्युंजयकारांचे मित्र असलेले. त्यांनी त्यांना आमंत्रित केले होते. लष्करातील अधिकाऱ्यासारखे रुबाबदार व्यक्तिमत्व असणाऱ्या शिवाजी सावंतांचे प्रथम दर्शनच आदर निर्माण करणारे.. प्रेमात पडणारे.

शाळेच्या ग्रंथालयात ‘मृत्युंजय ‘ होतीच. माझ्यासह काही विद्यार्थ्यांनी त्यावेळच्या आकलनशक्ती नुसार वाचलेली आणि कार्यक्रमाच्या अगोदरच काही दिवस पाहुण्यांचा सविस्तर परिचय करून देण्याच्या शाळेच्या प्रथेनुसार सर्व विद्यार्थी वर्गाला परिचित झालेली व्यक्ती समोर पाहून मनात आनंदघन बरसू लागलेले.

मृत्युंजयकार बोलायला उभे राहिले. शब्द जणू जिव्हेवर येण्यासाठी आतुर झाले असावेत अशी ओघवती, काळजाला साद घालणारी भाषा.. त्यांचे बोलणे आणि आपले ऐकणे संपूच नये असे प्रत्येकाला वाटायला लावणारे वक्तृत्व. त्यांनी मृत्युंजयचा सारा निर्मिती प्रवास कथन केला.. कुरुक्षेत्राचा त्यांनी केलेला प्रवास, कर्णाबद्दलच्या लोककथा, दंतकथा, काही ग्रंथांचा अभ्यास, चिंतन, मनन ते विदित करत होते आणि आम्ही सर्व सहप्रवासी झालो होतो.

मृत्युंजयकारांनी त्या क्षणी मनात चिरंतन असे आदराचे स्थान निर्माण केले. मृत्युंजय नावाप्रमाणेच अजरामर अशी साहित्यकृती. रसिकवाचकांचे अढळ प्रेम लाभलेली, त्यांच्या मृत्युंजय, छावा, युगंधर या साऱ्याच साहित्यकृतींना राज्य शासनाचे, साहित्य अकादमीचे आणि नामवंत मानले जाणारे अनेक पुरस्कार मिळाले..

भारतीय साहित्यजगतातील नोबेल पुरस्काराइतकाच सर्वश्रेष्ठ मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार भारतीय ज्ञानपीठच्या संस्थापक अध्यक्षा रमाबाई यांच्या प्रेरणेने त्यांचे पती श्री. साहू शांती प्रसाद जैन यांनी १९६१ ला द्यायला सुरुवात केली होती. त्यानंतर १९८३ सालापासून मातोश्री मूर्तिदेवी यांच्या स्मरणार्थ भारतीय संस्कृती व तत्वज्ञान यावरील भारतीय भाषेतील ग्रंथासाठी पुरस्कार द्यायला सुरुवात केली. ज्ञानपीठ इतकाच महत्वाचा असा मूर्तिदेवी पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार १९९४ साली ‘ मृत्युंजय ‘कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना देऊन सन्मानित करण्यात आले. मराठीला मिळालेला हा एकमेव पुरस्कार आहे. मृत्युंजयकारांच्या साहित्यकृतीं अनेक भाषेत भाषांतरित ,अनुवादित झाल्या आणि गाजल्याही. या साऱ्या साहित्यकृतींना रसिक वाचकांचे अढळ प्रेम लाभले आणि आजही लाभत आहे.

शिवाजी सावंतांच्यामुळे आधी कर्ण भेटला.. समाजव्यवस्थेचा, समाज विचारधारेचा नाहक बळी ठरलेला, जन्मताच जन्मदात्या आईच्या मातृसुखाला पारखा झालेला पण अधिरथ व राधा या पालनकर्त्या आई वडिलांचे प्रेम लाभलेला, आयुष्यभर खऱ्या अर्थाने उपेक्षितच ठरलेला कर्ण..

छावा मध्ये छत्रपती संभाजी महाराज भेटले. राजकारणाचे नाहक बळी ठरलेले, जन्मापासून जन्मदात्या आईच्या मातृसुखाला पारखे झालेले पण जिजाऊ आणि धाराऊ चे निर्व्याज प्रेम लाभलेले, राजकारणामुळे आयुष्यभर विनाकारण प्रवादांनी घेरलेले उत्तुंग व्यक्तिमत्व..

युगंधर मध्ये कृष्ण भेटला. तोही जन्मदात्या आईच्या मातृसुखाला पारखा झालेला पण नंदराय आणि यशोदेचे निर्व्याज प्रेम लाभलेला.. महाभारतातील देवपदाला पोहोचलेली व्यक्तिरेखा.

या महावीर असणाऱ्या तीनही नायकांची आयुष्य समाप्ती ही ते निशस्त्र असताना झाली.. कर्णाची युद्धभूमीवर , छत्रपती संभाजी राजांची शत्रूच्या कैदेत स्वराज्यासाठी अनन्वित छळ सोसत..मनाला व्यथित करणारी, डोळ्यात अश्रू आणि त्वेष, चीड आणणारी… आणि कृष्णाची झाडाखाली निवांत बसला असताना व्याधाचा बाण पायाच्या अंगठ्यात लागून.

मृत्युंजयकारांनी अनेक पुस्तके लिहिली पण मृत्युंजय, छावा, युगंधर यातील एक जरी कादंबरी त्यांनी लिहिली असती तरी त्यांचे नाव मराठी साहित्यात अजरामरच झाले असते.

आयुष्यात आजवर अनेकदा मृत्युंजयकार भेटत राहिले..एक दोनदा प्रत्यक्ष, अनेकदा शब्दांतून.. आजही भेटतात.. कधी ‘ मृत्युंजय ‘ मधून, कधी ‘ छावा ‘मधून तर कधी ‘ श्रीकृष्ण : एक चिंतन ‘ मधून, ‘ युगंधर ‘ मधून… प्रत्येक भेट काळीज कोंदणात जपून राहिलेली. पुन्हा पुन्हा भेटावे असे वाटणारी.

जीवन अनुभवसंपन्न करणारी वाचनानुभूती देणाऱ्या, आपल्या शब्दवैभवाने चिरंजीव झालेल्या मृत्युंजयकारांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन !

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ टाॅलस्टाॅयच्या शोधात ☆ संग्राहक – श्री समीर गायकवाड

? विविधा ?

☆ टाॅलस्टाॅयच्या शोधात ☆ संग्राहक – श्री समीर गायकवाड ☆

(व्हाट्सएप्प वरून साभार)

सोशल मीडिया माणसाला खूप स्क्रोल करवतो

लोक नुसते भराभर मागे पुढे होत राहतात

एखाद्या चांगल्या वॉलवर, पोस्टवर थांबत नाहीत

पुढेपुढे जात राहतात

नुसते स्क्रोल होत राहतात

पुढे जाऊन याची सवय होते

 

सलग गाणं ऐकत नाहीत

एका कडव्यानंतर बदलतात

 

टीव्ही पाहत बसल्यावर अवघ्या काही मिनिटागणिक चॅनेल बदलत राहतात

 

पुस्तके वाचत नाहीत, वाचायला घेतलीच तर भराभर पाने पालटतात

 

फिरायला गेले तर एका जागी बसत नाहीत

 

सिनेमा नाटकास गेले तर दहाव्या मिनिटाला विचलित होतात

 

प्रवासात असले तर खिडकी बाहेरचं जग पाहत नाहीत

 

कुठे काही दिसलं जाणवलं तर डोळ्याने पाहत नाहीत हातातला मोबाईल काढून शूट करू लागतात !

 

लोक नुसते पुढे पुढे जात राहतात

बाजारात गेले तर दुकानामागून दुकाने पालथी घालतात

 

गप्पा मारताना सलग काही तास एका जागी बसू शकत नाहीत

 

एकत्रित सिलेब्रेशन करताना देखील पहिल्या तासानंतरच वेगवेगळे कोंडाळे करून बसतात

 

बातम्या पाहताना वाचताना कहर करतात नुसत्याच हेडलाईन्स पाहतात,

दृश्ये पटापट पुढे सरकावित यासाठी तिष्ठतात

 

खोलात जाऊन विचार करणं, स्वतःला प्रश्न विचारणं बंद केलंय  

मन कशातच लागत नाही, वागण्या बोलण्यातली सलगता हरवून बसतात

 

सिनेमे आठवड्यात बदलतात, गाणी दिवसाला बदलतात

आताच्या घडीला ट्रेंड कुठला आहे हे पाहण्याचा सोस बाळगतात

 

ट्रेंडप्रमाणे बोलतात, लिहितात, रडतात, हसतात, धावतात, थांबतात, श्रद्धांजली वाहतात, शुभेच्छा देतात

 

लोक नुसते बाहुले झालेत, नुसते धावताहेत

 

मी वाट पाहतोय टॉलस्टॉयच्या गोष्टीतल्या शेवटाची

जमिनीच्या हव्यासापोटी धावणाऱ्याच्या कोसळण्याची,

आहे तो आनंद गमावून बसल्याची जाणीव होण्याची !

 

माणसांच्या वागण्यात, विचारात, जीवनात, सामुदायिक वर्तनात जुने काहीच उरलेले नाही

माणसाचाच एक ट्रेंड झालाय

 

मी टॉलस्टॉयला शोधतोय.

तुम्हाला दिसला का तो ?

 

संग्राहक – श्री समीर गायकवाड

(व्हाट्सएप्प वरून साभार)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व ☆ डाॅ.संजय ओक

? विविधा ?

☆ चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व ☆ डाॅ.संजय ओक ☆

माझ्या विभागात माझ्याबरोबर काम करणाऱ्या सहयोगी प्राध्यापिकेचा आठ वर्षांचा चुणचुणीत मुलगा.. काळानुरूप नव्या मॅक्डोनाल्ड आणि पिझ्झा-हट संस्कृतीचा प्रतिनिधी. ‘दिवाळीच्या सुट्टीत काय किल्ला वगैरे करणार का?’ या माझ्या बाळबोध प्रश्नाला, ‘नाही अंकल, मी पर्सनॅलिटी बिल्डिंगच्या क्रॅश कोर्सला जाणार आहे,’ असे उत्तर देता झाला आणि मला धक्काच बसला.

आमच्या लहानपणी आम्ही विटा, गोणपाट, माती, चिखल यांनी किल्ले बांधायचो. त्यावर छानसे अळीव पेरायचो. मावळे आणि महाराजांचे पुतळे आणायचो. किल्ल्याच्या पायथ्याशी रस्ता असायचा. त्यात आमच्या इम्पाला, फोर्ड अशा जुन्या गाडय़ांची पुन: पुन्हा रंगवलेली खेळण्यातली मॉडेल्स ठेवायचो. ‘महाराजांच्या काळात इम्पाला कशी?’ असले ऐतिहासिक प्रश्न आम्हाला पडायचे नाहीत. पण किल्ला बांधणे हा दिवाळीच्या सुट्टीतला सर्वात आनंददायी कार्यक्रम होता, हे खरे!

आता हा आठ वर्षांचा आतिश पर्सनॅलिटी बांधून काढण्याच्या कोर्सला जाऊन आपली दिवाळी सत्कारणी लावणार होता. खूप फरक जाणवला मला त्या क्षणी दोन काळांत., दोन बालपणांत.

आमचे बालपण आमच्या हातात अदृश्य वज्रमुठी घालत होते. आता रिस्ट-बॅण्डचा जमाना होता. आमच्या आई-वडिलांना पर्सनॅलिटीत गम्य नव्हते; पण आपल्या मुलांची जडणघडण चिरेबंदी चारित्र्याची व्हावी, त्याच्या ठायी अक्षय मूल्यांची पायाभरणी व्हावी यासाठी किल्ला, चिरोटे, फराळ, धन्वंतरी- पूजन या साऱ्या गोष्टींचा आग्रह होता. या गोष्टींनी आमचे बालपण समृद्ध केले. चारित्र्य हे असे कळत-नकळत घडत गेले. पर्सनॅलिटी फार नंतर अवतरली.

“चारित्र्य” आणि “व्यक्तिमत्त्व” या नाण्याच्या दोन बाजू. छापा आणि काटा एकमेकांपासून जितके वेगळे, तितक्याच निराळ्या या बाजूही. पण नाणं पूर्ण व्हायचं असेल आणि त्याला ‘चलनी’ म्हणून व्यवहारात चालवायचे असेल तर दोन्ही आवश्यक. मग त्या दोन बाबींत नेमका फरक तो कोणता?

चारित्र्य दिसत नाही; ते असते. व्यक्तिमत्त्व दिसते, त्याची छाप पडते. चारित्र्य हा अस्तित्वाचा गाभा असतो, तर व्यक्तिमत्त्व हा अस्तित्वाचा एक भाग असतो. चारित्र्य उजळते, व्यक्तिमत्त्व झळाळते. चारित्र्य म्हणजे माजघरात किंवा देवघरात तेवणाऱ्या नंदादीपाची ज्योत. व्यक्तिमत्त्व म्हणजे उघडझाप करणारी इलेक्ट्रिकची चायनीज माळ. चारित्र्य उघडय़ा दारातून आत येते, व्यक्तिमत्त्व खिडकीतून डोकावते. चारित्र्य टिकाऊ असते, तर व्यक्तिमत्त्व दिखाऊ असते. व्यक्तिमत्त्व म्हणजे वड, तर चारित्र्य म्हणजे चंदन. वडाच्या पारंब्यांनी जसा त्याचा संभार पसरतो, तद्वतच व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावामुळे अनुयायांची मांदियाळी वाढते. चंदनाच्या अस्तित्वाची साक्ष पटविण्यासाठी त्याला पारंब्यांची गरज नाही, तर त्याचा गंधच रानोमाळी त्याची महती सांगतो. थाळीत टाकलेला भाकरीचा तुकडा तोंडाला लावण्यापूर्वी डोळ्यांतून निष्ठा, भक्ती, कृतज्ञता आणि स्नेहबंध यांची पोचपावती देणाऱ्या घरातल्या श्वानासारखे चारित्र्य हे नि:शब्द बोलते. तर मालकाला मिळो- ना मिळो; मला माझे दूध कमी पडता कामा नये; आणि पडलेच, तर ओटय़ावरच्या भांडय़ाला पंजा मारायला मागे-पुढे न पाहणाऱ्या मन्यासारखे व्यक्तिमत्त्व हे मतलबी, आत्मकेंद्रित आणि स्वत:पुरते असते. चारित्र्य घडते ते संस्कारांतून, शिकवणीतून आणि अनुकरणातून. व्यक्तिमत्त्व घडविले जाते ते आकारातून, अंधानुकरणातून आणि प्रसंगी अविचारातून.

पण मग आज व्यक्तिमत्त्वाचाच बोलबाला का? त्याच्या संपादनासाठी पदरमोड करून क्लासेस कशासाठी? उत्तर सोपे आहे. व्यक्तिमत्त्व विकले जाते. त्याची बोली लागते. चारित्र्य विकावू नसतेच मुळी. आणि त्याची किंमत जगाच्या बाजारात सहजासहजी ठरविता येत नाही. व्यक्तिमत्त्वाचा व्यवहार होतो आणि म्हणूनच आजच्या देवाणघेवाणीच्या जगात त्याची चलती आहे. त्याच्यासाठीच सारे काही.. कोणते कपडे घालायचे? कोणत्या जिममध्ये जायचे? पर्सनल ट्रेनर ठेवायचा की एरोबिक्स इन्स्ट्रक्टरला बोलवायचे? कोणते अन्नपदार्थ खायचे? काय टाळायचे म्हणजे आपले व्यक्तिमत्त्व उठून दिसेल? याचीच सर्वत्र चर्चा.

या विचारांच्या आवर्तनात सापडलो असताना काही वर्षांपूर्वी नायर रुग्णालयात घडलेला एक प्रसंग आठवला.

एके दिवशी डीन ऑफिसात दरवाजाखालून एक चिठ्ठी आत आली- ‘सर, द्वितीय वर्षांतला सतीश दिवसातून फक्त एकदाच जेवतो. त्याच्या घरी अडचण आहे. त्याला दुसऱ्या वेळच्या जेवणाची सोय करू शकाल का?’ शंभर मुला-मुलींमधून सतीशला शोधणे फारसे कठीण नव्हते. अपुऱ्या अन्नग्रहणाच्या खाणाखुणा अंगावर वागवीत हा काळासावळा, नम्र मुलगा मला भेटला. त्याच्या डोळ्यांत मला विनम्रता, सलज्जता, थोडीशी असहायता या साऱ्या भावभावनांचे दर्शन झाले. कँटीनवाल्याला सांगून मी त्याची रात्रीच्या थाळीची सोय केली. झाला प्रसंग मी विसरूनही गेलो.

साडेतीन महिन्यांनंतर सतीश परत कार्यालयात हजर. खाणे थोडेफार अंगी लागले होते. माझ्या कपाळावर कळत-नकळत आठी. ‘आता काय आणखी?’ असे भाव.

सतीश नमस्कार करून बोलता झाला- ‘सर, घरचा प्रश्न थोडा मार्गी लागला. मला वडील पैसे पाठवू शकतात. आता मी माझे बिल भरेन. आपले आभार मानायला आलो आहे.’

“चारित्र्य” आणि “व्यक्तिमत्त्व” यांतला माझ्या मनातला गुंता तत्क्षणी सुटला.

© सौ.सुचित्रा पवार

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – तो असा, ती तशी !☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? तो असा, ती तशी ! ?

“जागा आहेस, का नुसताच लोळत पडलायस ?” हे थोडं दरडावणीच्या सुरात, आपल्या कानावर आपण लहान असतांना आईकडून आणि मोठेपणी (आपापल्या) बायकोकडून ऐकण्याचे अनेक प्रसंग आपल्यावर आत्ता पर्यंत नक्कीच आले असणार ! कारण झोपेतून जागे झाले तरी, 99.9% पुरुषांना लोळत पडून रहायची सवय असतेच असते, मग तो कामाचा दिवस असो वा सुट्टीचा ! ही टक्केवारी, मी एखाद्या साबणाच्या जाहिरातीत म्हटल्याप्रमाणे, रोग जंतूचा नाश करण्याच्या त्याच्या क्षमते इतकीच घेतली आहे, हे माझ्या सारख्या चाणाक्ष नवऱ्यांनी लगेच ओळखलं असेलच ! आता हे साबणाचे उदाहरण देण्या मागे सुद्धा माझे स्वतःचे असे एक सबळ कारण आहे, जे तुम्हाला पण 100% पटेल ! आपण जागे झालोय आणि नुसतेच लोळत पडलोय हे नंतर बायकोने ओळखल्यावर, ती आपल्या मागे भुणभुण करून आपल्याला सुद्धा तिच्या मागोमाग उठायला भाग पाडून, तेव्हढयावरच ती थांबली, तर ती अर्धांगिनी कसली ?  तिला असं वाटत असतं की, आपल्या नवऱ्याने पण, भूतां सारखे लोळत पडण्यापेक्षा, लगेच उठून आपल्या सारखेच लगेच सुचीरभूत व्हावे ! आता भूतं जाग आल्यावर अशीच लोळत (का झाडावर लटकत?) पडतात, हे तिला कसं कळलं का तिला कोणी (तिची आई?) तसं सांगितलं, हा एक झोप न घेता करायचा संशोधनाचा विषय ठरू शकतो ! या माझ्या विधानाशी, माझ्या सारखे 100% आळशी नवरे, सहमत होऊन भली मोठी जांभई देत, परत आपल्या डोक्यावरून पांघरूण घेऊन गादीला जवळ करतील, याची मला 100% नाही तर 101% खात्री आहे ! आणि या उप्पर जरी नवऱ्याने तिला प्रेमाने (का स्वार्थापोटी ?) म्हटलं “झोप की जरा, आज सुट्टी तर आहे !” तरी 100% बायका, ते जणू ऐकलंच नाही असं भासवत, ते अजिबात मनावर न घेता, लगेच आपल्या रोजच्या कामाला स्वतःला जुंपुन घेतात, हे तमाम नवरे मंडळी मान्य करतील !

असं जाग आल्यावर लोळत पडणं वगैरे बायकांना झेपत नाही, का त्यांना ते जमत नाही, का त्यांची मानसिक घडणंच तशी असते, हे त्या निद्रादेवीलाच माहित ! त्या जाग आल्या आल्या लगेच, कुणीतरी आपल्या पाठीमागे अदृश्यपणे छडी घेऊन उभा आहे या भीतीने, रोजच्याच अंगावळणी पडलेल्या कामाला, वाघ मागे लागल्यागत सुरवात करतात ! तो अदृश्य छडीधारी कोण असेल, याचा मी अनेक वेळा माझ्या (बायकोच्या म्हणण्या नुसार) अल्पमती प्रमाणे शोधायचा अनेक वेळा विफल प्रयत्न केला, पण तो करता करता कित्येक वेळा परत  झोपेच्या अधीन कधी झालो, हे माझंच मला कळलं नाही ! शेवटी मी तो नाद सोडून दिला आणि माझ्या मनाची मीच अशी समजूत करून घेतली की, सकाळी उठल्या उठल्या रोजच्या कामाचा तोच तोच व्यायाम केल्याशिवाय, तमाम बायकांना त्यांचा दिवस सुरू झालाय असं वाटतच नाही ! असो !

आता या अशा पेच प्रसंगातून मार्ग कसा काढावा, याचा विचार करता करता मला, थोरा मोठ्यांनी जे काही मोठ्या मनाने म्हणून ठेवलं आहे, त्याची आठवण झाली ! जसं, ऐकावे जनाचे (बायकोचे) करावे मनाचे ! म्हणजे तुमच्या लक्षात मतितार्थ आला असेलच, की आपल्याला देवाने जे दोन कान दिले आहेत, त्याचा योग्य वापर करून, म्हणजेच एका कानाने बायकोचे ऐकून, तेच दुसऱ्या कानाने सोडून, डोक्यावर पांघरूण घेवून मस्त ताणून देणे !

निद्रादेवीचा विजय असो !

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अभियंता दिन – भारतरत्न सर विश्वेश्वरय्या ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? विविधा ?

☆ अभियंता दिन – भारतरत्न सर विश्वेश्वरय्या ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆ 

१५ सप्टेंबर हा दिवस भारतात ‘ अभियंता दिन ‘ म्हणून साजरा केला जातो. भारताचे पहिले अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा हा जन्मदिवस. ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले गेलेले विश्वेश्वरय्या हे ध्येयवादी आणि थोर देशभक्त होते.

कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील मुद्देनहळ्ळी खेड्यात १५ सप्टेंबर १८६१ ला त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील श्रीनिवासशास्त्री हे विद्वान संस्कृत पंडित होते. आईने त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. शिक्षणासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले आणि बंगळूरमधून विशेष गुणवत्ता किताब घेऊन बी.ए केले.

त्यांना तांत्रिक शिक्षणाची आवड लागली. म्हैसूरच्या राजांनी त्यांना शिष्यवृत्ती देऊन पुण्यात अभियांत्रिकी पदवी साठी पाठवले. अत्यंत कठीण अशी इंजिनीयरिंग ची अंतिम परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करून मुंबई राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.स्थापत्य शास्त्रातील त्यांच्या ज्ञानाचा लौकिक सर्वत्र पसरला.त्याची नोंद घेत सरकारने मुंबई इलाख्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता म्हणून नेमणूक केली. याच काळात खडकवासला धरणासाठी त्यांनी स्वयंचलित गेटची निर्मिती केली. भारतात प्रथमच हे गेट केले गेले. या डिझाईनला ‘विश्वेश्वरय्या गेट’ हे नाव दिले गेले.

१९०४ साली बढती मिळून देशाचे पहिले अभियंता होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला. संपूर्ण देशातून त्यांचे कौतुक झाले.

वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी २४ वर्षे नोकरी केली आणि १९०७ चाली सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर हैद्राबाद सरकारचे विशेष सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली.मूसा आणि इसा या दोन नद्यांवर धरणे बांधून त्यांनी फार मोठे काम केले.

त्यानंतर म्हैसूरच्या राजांनी मुख्य अभियंता म्हणून त्यांना बोलाविले.ते म्हैसूरला आले ‘ कृष्णराज सागर ‘ या कावेरी नदीवरील धरणाचे काम त्यांनी पूर्ण केले.वृंदावन उद्यान, म्हैसूर सॅंडल ऑईल ॲंड सोप फॅक्टरी, म्हैसूर विश्वविद्यालय, बँक ऑफ म्हैसूर या इमारती आणि धरणे ही त्यांच्या कार्याची पावती आहे.शिक्षण, उद्योग, कृषी अशा सर्व क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली. सर्वांगीण विकासासाठी अनेक गोष्टी , उद्योगांना चालना दिली.समाजोन्मुख कामे केली. ‘कर्नाटकच्या विकासाचा भगिरथ’ म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. त्यांचा गौरव म्हणून म्हैसूर संस्थानचे ‘दिवाण पद ‘त्यांना बहाल केले गेले.

आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांसाठी काहीतरी करण्याची जिद्द त्यांच्यात होती. शेतकऱ्यांना शेतीचे ज्ञान व्हावे म्हणून त्यांनी ‘म्हैसूर विद्यापीठा’ची स्थापना केली. सिंचन क्षेत्रासाठी मौलिक असे योगदान दिले. पाण्याचा अपव्यय टाळून पुरेपूर वापर करणारी ब्लॉक सिस्टीम ही त्यांची देणगी आहे.

भद्रावतीचा लोखंड आणि पोलाद कारखाना ही त्यांची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. मुंबईची प्रीमियर ऑटोमोबाईल इंडस्ट्री, हिंदुस्तान एअरक्राफ्ट फॅक्टरी ( आत्ताची दि हिंदुस्तान एराॅनाॅटिक्स ) आणि ग्रामीण औद्योगिक प्रकल्पांच्या योजनेत त्यांनी भाग घेतला. धुळे, सुरत, सक्कर, कोल्हापूर, मुंबई, कराची, धारवाड, विजापूर अशा अनेक शहरांच्या पाणीपुरवठा योजना त्यांनीच कार्यान्वित केल्या. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अभ्यासक्रम ठरविण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. पुण्याच्या डेक्कन क्लबच्या स्थापनेतही त्यांनी भाग घेतला. त्यांनी औद्योगिकीकरणाची मुहूर्तमेढ रोवली.

सेवानिवृत्तीनंतर चाळीस वर्षे विविध समित्या आणि संस्थांमध्ये विविध पदांवर अखंडपणे मोलाचे काम केले. त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते.अगदी साधी राहणी होती. म्हैसुरी पद्धतीचा फेटा आणि साधी वेशभूषा त्यांनी शेवटपर्यंत जपली. त्यांचा स्वभाव साधा होता.पण काही बाबतीत परखड होता. ‘शिस्त ‘हा त्यांचा परवलीचा शब्द होता. ते सतत कठोर परिश्रम करीत. प्रत्येक काम नियमित, नीटनेटके आणि स्वच्छ असावे हा त्यांचा आग्रह असे. त्यांना अंधश्रद्धा मान्य नव्हती. माणसात देव आहे आणि माणसाची सेवा हीच ईश्वरसेवा आहे असे त्यांचे प्रामाणिक मत होते.

ब्रिटिश सरकारने त्यांना ‘सर’ हा किताब बहाल केला. अनेक विद्यापीठांनी सन्माननीय ‘डि.लीट’ने गौरविले. वयाच्या ९४व्या वर्षी सरकारने ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट काढले. बंगळूरचे ‘सर विश्वेश्वरय्या सायन्स म्युझियम’ भारतातले सर्वात मोठे सायन्स म्युझियम आहे. त्यांचा जन्मदिवस ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो.महाराष्ट्र सरकार तर्फे त्यांच्या स्मरणार्थ ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ दिला जातो.

ते शतायुषी होऊन निरामय जीवन जगले. १४ एप्रिल १९६२ साली वयाच्या १०१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांचे हे अफाट कार्यकौशल्य अत्यंत गौरवास्पद आहे. एका उत्तुंग, महान चरित्राचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे. त्यांच्या स्मृतींना शतशः प्रणाम !! ?

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

पुणे 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्राजक्ताची फुले .. ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

? विविधा ?

☆ प्राजक्ताची फुले ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

जेव्हा जेव्हा मला तुझी आठवण येते

मी प्राजक्ताला पहाते

ही टपटपणारी फुले जणू

आहेत अबोल अश्रुधारा …

हो ना …तू असा दुनियेच्या संसारात गुंतलेला तुला कुठे ठाऊक आहेत या उरीच्या वेदना ?? या प्राजक्ताच्या झुळुकीसारखेच तुझे अस्तित्व …तू आलास म्हणून मोहरून जातात दिशा …स्तब्ध होतो वारा …… मध्यान रात्री पक्षी फडफडतात …सूर्यही अवचित डोकावतो अवेळी काळ्याशार ढगांच्या जळात …गायी कान टवकारतात ..इतकेच काय ती तुझी बासुरी सुद्धा अधीर होते तुझ्या कोमल अधरांवर विसावायला …थरथरते तिचीही काया अन अधीर होते तुझ्या मंजूळ स्पर्शासाठी …केवड्याच्या बनात नाग उगीचच सळसळत रहातात …निशिंगन्ध डोकावतो हळूच हिरव्या पानाअडून तुझ्या आगमनाची वार्ता पसरावयाला ! पण …पण तू येतोस …विद्युल्लतेच्या वेगाने … धड -धड होते काळजात ..कालिंदीच्या डोहात तरंग उठत रहातात …आसुसतो तोही डोह …तुझ्या चरण कमलाना स्पर्शायला … धावते वेड्यासारखी तुझ्या भेटीला पण …पण पितांबर  लहरत रहातो रुक्मिणीच्या परसदारात …चांदणं झुला झुलत राहतो …..कर -कर आवाज अंधार कापत जातो ..कस्तुरी रेंगाळत रहाते आसमंतात …खोलवर श्वासात रुतत जाते माझ्या .. .. अन … अबोल प्राजक्त हळुवार ओघळतो त्या काजळलेल्या डोळ्यांच्या व्याकूळ काळोखात नि:शब्द ….

 

© सौ.सुचित्रा पवार

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कैलासाहून पृथ्वीवर गणेशआगमन.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ कैलासाहून पृथ्वीवर गणेश आगमन.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आज कैलासावर अगदी लगबग चालली होती! गणपती बाप्पा दहा दिवसासाठी पृथ्वीतलावर जाणार होते. त्यातच आज पार्वती चा उपवास! अगदी कडकडीत! बारा वर्षे रुईची पाने चाटून, वनात राहून, तपश्चर्या करून तिने शंकराला प्राप्त करून घेतले होते.

हिमालयाने, तिच्या पित्याने स्वर्गातील उत्तमोत्तम स्थळं सुचवली असतील तिला!पण हा भोळा शंकर तिच्या मनी वसला होता! त्यासाठी  तिने उग्र तपश्चर्या करून शंकराची मर्जी संपादन करून घेतली होती.कैलासावर त्यांचे सुखाचे राज्य चालले होते.

कार्तिकेयाच्या जन्मानंतर सुखावले. दुसऱ्या बाळाची चाहूल लागताच पार्वती आणखीच आनंदली! या बाळाच्या जन्माच्या खूप आख्यायिका आहेत.कोणी म्हणतं, घामाच्या मळापासून गणराया ची निर्मिती झाली. गणरायाला हत्तीचे तोंड कसे मिळाले याची कथा वेगळीच आहे, एकदा पार्वती माता स्नान गृहात होत्या. त्यांनी गणपतीला दारात बसवून ठेवले होते आणि कुणाला हि आत पाठवू नको,  असे त्याला सांगितले होते. अचानक शंकराची स्वारी आली पण गणपती काही त्यांना आत सोडेना! तेव्हा क्रोधाविष्ट झालेल्या शंकराने त्याचे मस्तक उडवले. मग पार्वतीने खूप शोक केला, तेव्हा शंकरांनी तिला गणपतीला पुन्हा त्याचे मुख आणून देतो असे आश्वासन दिले! दुसऱ्या दिवशी जो कोणी शंकराच्या दृष्टीस प्रथम पडेल ते मुख आणायचे ठरले. ठरल्याप्रमाणे सकाळी शंकराची स्वारी बाहेर पडली, तेव्हा त्यांना पहिले दर्शन हत्तीचे झाले. मग काय! शंकरांनी त्याचा वध करून ते मुख घरी आणले आणि गणपतीला बसवले. तेव्हापासून गणपती बाप्पाला हत्तीचे तोंड मिळाले. आणि छातीवर सोंड ठेवणारा, सुपाएवढे कान असणारा असा गणपती बाप्पा आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला. तोच वक्रतुंड महाकाय असा गणपती बाप्पा आपल्याला पूजनीय झाला.

  या गणपतीला सर्वांच्यात मिसळून राहण्याची फार हौस! कैलासावर कंटाळा आला म्हणून पृथ्वीवर माणसांबरोबर राहायला येतो तो दहा दिवस! पार्वती माता काळजीने सांगते,’ हे भूक लाडू घेऊन जा. लवकर परत ये. तिथेच रमून राहू नकोस. तुझ्या उंदरासाठी सुद्धा मी खाऊ देते!

त्याची काळजी घे. आधीच हरितालिका व्रत करून पार्वतीदेवी थकलेली असते.तरी ती  गणपतीला लाडू करून देते! कार्तिकेयाला ही गणपती जाणार, म्हणून वाईट वाटत असते. तो गणपतीला म्हणतो,’ कसा रे जाणार तू एवढ्याशा उंदरावरून?’ पण गणपती त्याच्या त्या छोट्याशा वाहनावरून जायला सिद्ध झालेला असतो. शंकरबाबा गणपतीला सांगतात,’ तिकडे फार मोदक खात बसू नकोस! लवकर परत ये.’त्या सर्वांना गणपतीला सोडताना फार वाईट वाटत असते.

तर इकडे पृथ्वीवर धूम धडाका चालू असतो, गणरायाच्या आगमनाच्या तयारीचा! आरास, महिरपी, वेगवेगळ्या प्रकारचे लाइटिंग अशी सगळी तयारी चालू असते. स्त्रिया गणपतीच्या स्वागतासाठी सज्ज असतात. गणपती पाहुणा येणार असल्यामुळे त्याच्यासाठी खिरापत, मोदका ची तयारी होते. नवीन वस्त्रे, दागिने यांनी बाजारपेठ सजते. लोक उत्साहाने तयारी करतात. घरातील वातावरण उत्साहाने  भरलेले असते. मुलांना मोदकाचे वेध लागलेले असतात. आरत्या म्हणायच्या असतात. गणपती पाहुणा येणार म्हणून दारात रांगोळी काढली जाते, तोरणं लावली जातात, गणरायासाठी वेगळाच थाट! त्याला कुठे बसवू या, त्याचे स्वागत कसे करूया, या विचारात फुलांच्या, लाईटच्या, कागदांच्या, रंगीबेरंगी माळा व दिवे लावले जातात. तो हा हरितालिकेचा दिवस असतो.

जणू पार्वती आधी पृथ्वी वर येऊन त्याच्या स्वागताची सर्व तयारी झाली आहे ना घरोघरी, ते पाहून जाते! उद्या ती त्याची आई म्हणून मिरवणारे असते, तर दोन दिवसांनी तीच गौरी बनून माहेरवाशीण म्हणून येणार असते.ही दोन्हीही नाती प्रेमाची असतात! दोन्ही नात्यात तिचे हे रूप मनोहर दिसते! तोच उत्साह निसर्गातही दिसून येतो.पावसाच्या सरी वर सरी येत रहातात आणि वातावरणात प्रसन्नता आणतात.

गणरायाचे आगमन होताच सगळीकडे आनंदीआनंद पसरतो.

कैलासा वरून पृथ्वीवर आणि आपल्या घरात! उंदराच्या वहानावरून! उद्या बाप्पा ला मोदकाचे जेवण मिळणार!

आणि रोज आरती प्रसादाने आसमंत जागा रहाणार!

संकटनाशक गणपती सौख्याची, आरोग्यदायी नवी लाट घेऊन येणार आहे, म्हणून गर्जू या,

  ? गणपती बाप्पा मोरया! ?

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆  गणपती बाप्पा मोरया …. ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ ?️ गणपती बाप्पा मोरया …. ?️☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

गणपती बाप्पा मोरया….

मोरया… चा जयघोष करत ढोल, ताशे, झांज, लेझीम च्या गजरात आगमन व्हायचे आमच्या गल्लीतल्या बाप्पाचे. पालखीत बसून सोवळ्यांने, गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत आगमन होत असे ह्या विघ्नहर्त्याचे. आम्ही सगळी मुलं त्या पालखी मागून चालत गणरायाला आणायला जात असू. गणपती बाप्पाचे

आगमन एका देवळात होत असे जिथे तो पुढे अकरा दिवस विराजमान होत असे. दररोज दोन वेळा, वेळेवर आरती होत असे आणि ती सर्वांनाच पाठ असल्यामुळे ती एका सुरात आणि एकाच लईतही होत असे.

आम्ही जसा गल्लीतला तसाच घरचा गणपती आणायला सुद्धा दर वर्षी बाबांबरोबर जात असू. आमची मूर्ती ठरलेली असायची. मध्यम आकाराची, पिवळे पीतांबर आणि केशरी शेला परिधान केलेली ,हिरे जडीत मुकुट असलेली, सुंदर बोलके डोळे आणि चेहर्‍यावर शांत, शीतल, तृप्त असे भाव, एका हातात मोदक आणि दुसर्‍या हातात कमळ. बरोबर मुषक हवेतच. मूर्ती बघून मनं कसं प्रसन्न होतं असे.

घरी आई आरतीचे ताम्हन घेऊन वाट पहात असायची ह्या एकदंताची. आम्ही पोहोचताच तिच्या चेहर्‍यावरचा भाव अगदी पाहण्या सारखा असायचा. प्रसन्न मनाने ती बाप्पाला ओवाळायची आणि आमचे बाप्पा विराजमान व्हायचे आम्ही त्यांच्या साठी केलेल्या खास आसनावर.

हे दिवस मात्र आमच्यासाठी खास असायचे कारण एक तर गणपती बाप्पा असे पर्यंत आईचा मूड एकदम झकास असायचा आणि रोज गोडाधोडाचे खायला मिळायचे. त्यात उकडीचे मोदक म्हणजे आहाहा.. बाप्पाला आणि आम्हालाही परम प्रिय. न चुकता आरती, अभिषेक, नैवेद्य अथर्वशीर्षाचे पठण व्हायचे. एकूणच वातावरण प्रसन्न आणि अल्हाददायक असायचे. पाचवे दिवशी घरी गौर यायची. त्या दिवशी आई खूप खुश असायची जणू तिचीच लेक आली आहे माहेरी. माहेरवाशीणी साठी पुरण पोळी ठरलेली.

हे अकरा दिवस कसे भुर्रकन उडून जायचे. आणि बघता बघता बाप्पाला निरोप द्यायचा दिवस यायचा. आमचा नावडता दिवसं त्या दिवशी सगळेच उदास असायचे. हा पाहुणा आपल्या घरी आता परत जाणार म्हणून खूप वाईट वाटायचे. आज आरती विशेष व्हायची. आईचे नेत्र भरून यायचे.पण काय करणार काहीच इलाज नसायचा. शेवटच्या दिवशी आम्ही सगळे देखावे बघायला जायचो. इतके सुंदर सुंदर देखावे असायचे आणि अनंत चतुर्दशी दिवशी भव्य मिरवणुका असायच्या. रात्रभर आम्ही मिरवणुका बघायचो आणि पहाटे परत यायचो.

आज मिरवणूक पहायला गेले होते गणपतीची आणि आनंद होण्या ऐवजी दुःखच झाले. समोरचं दृश्य पाहून कळेच ना नक्की कशाची मिरवणूक आहे ते. भक्तीगीतं भावगीतं कानी पडायच्या ऐवजी फास्ट ट्रॅक च्या गाण्यावर, धांगडधींगा चालू होता. दारूच्या नशेत बेधुंद होऊन गणपती बाप्पा समोर तरुण पिढी नाचताना पाहून खूप दुःख झाले. त्यांची त्यांनाही शुद्ध नव्हती. चुरमुऱ्यांची उधळण करत ती पायदळी तुडवत मिरवणूक चालली होती.

ते कमी म्हणून फटाकड्यांच्या धुराने सगळे वातावरण दूषित केले होते. मला प्रश्न पडला त्या विघ्नहर्त्याला तरी श्वास घेता येत असेल का ह्या धुरात?? ते दूषित वातावरण आणि कर्ण बधीर करणारा तो बॅंजो चा आवाज ऐकून परत यावं असं वाटत तरी असेल का त्या गणरायाला ?

टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना राबविली होती ती समाजाला संघटीत करण्याच्या उद्देशाने. आज त्यांनी जर हे अस दृश्य पाहिलं असत तर बहुतेक बेधुंद होऊन नाचणार्‍यांच्याच कंबरेतला पट्टा काढून चांगलं फोडून काढलं असत एकेकाला.

मित्रांनो जरा विचार करा आपण बदलू शकू का हे दृश्य?? राजकारणी लोकं आपलं पद आणि पैसा दाखवण्यासाठी एका गल्लीत तीन तीन गणपती बसवतात. नाही नाही तितकी श्रध्दा आहे म्हणून नव्हे तर माझा मंडप तुझ्या पेक्षा भारी हे दाखवण्यासाठी. मी किती किलोचे चांदीचे दागिने केले आहेत ह्या वर्षी ह्यासाठी,सत्तेसाठी.

आपण सगळे जर एकत्र आलो तर हे नक्की थांबवू शकू. एका गल्लीत एकच गणपती निदान एवढी तरी सुरवात करू शकू. बँजो वर नाचण्या ऐवजी सनई चौघडे, लेझीम आणि ढोलाच्या ठेक्यात बाप्पाला निरोप देऊ शकू. नशेत बेधुंद न होता भक्तीत तल्लीन होऊ शकू. चुरमुऱ्यांची उधळण करण्या पेक्षा तेच गोरगरिबांना वाटू शकू.

असं काही तरी करू की आपल्या पेक्षा जास्त गणराया वाट बघेल पुढच्या वर्षी येण्याची.

सहज मनाच्या कोपऱ्यातून ?

गणपती बाप्पा मोरया…

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares