मराठी साहित्य – विविधा ☆ शिक्षक दिन विशेष – लुगड्याची गोष्ट …. ☆ श्री रवींद्र देवघरे “शलभ’

☆ शिक्षक दिन विशेष – लुगड्याची गोष्ट …. ….☆  श्री रवींद्र देवघरे “शलभ’ ☆

रात्रीची वेळ.. निरव शांतता .. तेलाच्या दिव्याचा मिण मिणता प्रकाश.

सावित्रीबाई पांघरूण अंगावर घेऊन झोपण्याच्या तयारीत..

ज्योतीराव कौतुकाने आपल्या बायकोच्या कपाळा वर हात ठेवतात.

“,सावित्री. !” ज्योतीराव उद्गारले, “अगं, तुझं अंग गरम आहे. ताप येतोय का तुला ? “

“आहो, एवढं काही नाही .थोडी कण-कण आहे, झालं.” ,सावित्रीबाई.

“अग पण ही कण-कण वाढली तर आपल्या शाळेचं कसं होईल? ,

मुलींच्या शिक्षणाच काय होईल?……..

ते काही नाही,उद्याच वैद्यांना बोलावतो,
तू औषध घे म्हणजे लवकर बरी होशील.”‘,–ज्योतीराव.

“आहो, हा ताप औषधाने नाही जायचा.” सावित्रीबाई.

“मग?” ज्योतीरावांचा आश्चर्यचकित प्रश्न.

” तुम्ही मला शाळेत जाण्यासाठी अजून एक लुगडं देऊ शकलात तर हा ताप आपोआप जाईल.” सावित्रीबाई…..

ज्योतीराव काहीशा नाराजीने दुस-या कुशीवर वळून झोपण्याचा प्रयत्न करू लागले.

त्यांचे विचारचक्र सुरु झाले.
लुगड्यासाठी ताप घेणारी सावित्री नक्कीच नाही………..

मग सावित्री असे का बरं बोलली?……….

तिच्याकडे एक लुगडं असताना ती दुसरं लुगडं का मागते?………..

आपल्याकडे जे पैसे आहेत ते शिक्षण कार्या करता आहेत ….

बायकोच्या लुगड्या करिता नव्हे …………

पण सावित्री शाळेत जाण्याकरिता लुगडं मागतेय म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार………..

विचार करीत-करीत ज्योतीराव झोपून गेले.

दुस-याच दिवशी ज्योतीरावांनी सावित्रीबाई्च्या हातावर नवे लुगडे ठेवले.

बाईंच्या डोळ्यात पाणी आलं………..

लुगड्यासाठी खर्च करायला ज्योतीरावांना खूप त्रास झाला असणार,

कारण त्यांच्या जवळ जे पैसे आहेत ते शिक्षण कार्याकरिता……

सावित्रीबाई पक्के जाणून होत्या.
त्या नंतर बाईंना कधी ताप नाही आला.

ज्योतीरावांना आश्चर्य वाटले, “हे कसं काय.”………

लुगड्या साठी ताप घेणारी सावित्री नाहीच…………

ज्योतीरावांनी सावित्रीबाईंचे शाळेतील सहाय्यक होते, त्यांची भेट घेतली. आणि त्यांना सविस्तर प्रसंग सांगितला.

त्यांनी उलगडा केला,”सावित्रीबाई शाळेत येतांना लोक अंगावर शेण चिखलाचा मारा करतात.

बाई शाळेत आल्यावर अंगावरील लुगड्यावरचे शेण चिखलाचे डाग धुऊन ओल्या लुगड्याने दिवसभर शाळेत शिकवितात.

त्या मुळे रात्री त्यांना ताप येत असेल.

परंतु आता तुम्ही त्यांना दुसरं लुगडं दिल्या पासून शाळेत आल्यावर लुगडं बदलून माखलेलं लुगडं धुऊन ठेऊन कोरड्या लुगड्याने शाळेत शिकवितात .

त्या मुळे आत्ता त्यांना ताप येत नसेल.”

आत्ता ज्योतीरावांच्या डोळ्यात पाणी आलं..

सावित्रीबाईंच्या महानतेस ज्योतीरावांनी मनोमन प्रणाम केला…!!

आपणही त्या दोन्ही महान विभूतींस प्रणाम करू या…

कारण त्यांच्यामुळेच् आजच्या स्त्रीयां ज्या कुठल्यही जातीच्या असो की धर्माच्या शिकु शकल्या ..!!

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

© श्री रवीन्द्र देवघरे “शलभ’

नागपूर.

मो  9561117803.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पावसाची रुपं… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

 

? विविधा ?

☆ पावसाची रुपं… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी 

पावसाची रुपं

                   “येरे येरे पावसा

                    तुला देतो पैसा

                  पैसा झाला खोटा

                  पाऊस आला मोठा “

पैसा घे पण ये बाबा!पैसा खोटा निघाला तरी चालेल पण तू येच.” असं खरच म्हणावं अशी दडी तू मारतोस तर कधी “थांब थांब,थोडी उसंत घे रे.” असाही बरसतोस.

शब्द म्हणजे काय; त्यांचा अर्थ काय हे कळण्याआधीच तू माझ्या मनात बरसू लागलास. आई -आजी बरोबर मी ही टाळ्या वाजवत तुझ्या संगे ताल धरला.माझ्या बोबड्या बोलाने आईचा घट आनंदाने भरुन वाहू लागला. गालावरून हात फिरवत आजीचे हसूही तिच्या कापर्‍या गालांवर पसरले.

थोडी मोठी झाले. पावसाची गाणी,गाण्यातले शब्द, शब्दांची गंमत समजू लागली.

‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?

शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?’

मनातला भोलेनाथाला तथास्तु म्हणत हातात हात घालून तू माझ्या बरोबर खेळू लागलास. तुझ्याच साठलेल्या पाण्यात उड्या मारणं, डबक्यात साठलेल्या पाण्यातून मुद्दामच वेगानं सायकल चालवणं हे तूच तर मला शिकवलंस. कागदी नावा पाण्यात सोडून त्या बरोबर काठाकाठानं भिजत वाहतांना तूही माझ्या संगे मस्ती केलीस,हो ना?

टप टप थेंब वाजवत तू आलास की मी पाटी पुस्तक विसरून गारा वेचे,नाचे,खिदळे!! नक्कीच ते भोळे बालरुप तुलाही भावलं  असावं. . . . . तरीही रंगीबेरंगी रेनकोटात मला लपेटून बोट धरून तू मला शाळेतही नेलेस! खोट नको बोलू!नवीन पुस्तकांचा वास तुलादेखीलआवडत असे.

         ‘पाऊस वाजे धडाडधूम

         धावा धावा ठोका धूम

         धावता धावता गाठले घर

        पड रे पावसा दिवसभर ‘

बालबोलीतले हे कौतुक तुला देखील ऐकावेसे वाटे,काय ओळखलं ना बरोबर ?

बडबड गीतांचे अवखळ वय हळू हळू सरले. तुझे संगीत मनात गुंजी घालू लागले.

      ‘आला पाऊस मातीच्या वासात ग . .  .

पहिल्या पावसाचा मातीचा वास मनाला वेड लावू लागला .पावसात भिजण्यापेक्षा पाऊस अनुभवण्याचा सुज्ञ पणा आला. तू कधी सर सर येतोस, कधी रिमझिम बरसतोस. कधी पाऊलही न वाजवता येतोस तर कधी तांडवनृत्य करतोस . कधी कडकडाटी गर्जन करतोस तर कधी वार्‍याबरोबर सगळ्यांची दाणादाण उडवत येतोस.तुझी रुपे बघण्याचं, स्वत:तच रमण्याचं वय आलं. तू ही बालीश पणा सोडून खट्याळ झालास. आता तू माझी फजिती करु लागलास. कॉलेजला जाताना छत्री सांभाळत,कपडे सावरत,खांद्यावरची कंडक्टर बॅग लटकवत मी चालले की तू फिदीफिदी हसू लागलास. तू मुद्दामच वात्रट वार्‍याला माझी छत्री उलटी करायला सांगायचास. नेमकं सबमिट करायच जरनल तुझ्या मुळे चिखलात पडत असे. पण मी त्या गावचा नाहीच अस दाखवत तू तिथून पळ काढायचास.मी तुझ्या वर तेंव्हा रागावतच असे थोडीशी !

       पण तेव्हढ्यात तू गात आलास . . .

     ‘ऋतु हिरवा, ऋतु बरवा’

माझ्यासाठी इंद्रधनुची कमान उभी करुन आलास. असे वाटले की या कमानीवरुन सहजपणे चढून आकाशातल्या तुझ्या अंगणात पोचेन. खोट नाही . . अगदी खरचं!

निळ्यासावळ्या टेकडीवरून माझ्या चित्तचोरासमवेत हातात हात घालून फिरताना त्या पाचूच्या बनात सप्तरंगी कमान घेऊन भेटलास. पुढील सुखद सहजीवनाची तार कानात झंकारत रिमझिम बरसलास.

. . . . . . . वर्षे सरली. . . बेलबॉटमचे, नेलपेंटचे दिवस गेले,हातात इवलीइवलीशी झबली टोपडी आली, बाळलेणी आली. तू भेटायला यायचास पण बाळाचे वाळत घातलेले कपडे काढण्याची माझी धावपळ! तुझी रुपे निरखण्यापेक्षा बाळलीला जास्त मोहवत होत्या ना! स्वेटर मोजे विणण्याचे दिवस आले व गेलेही. पुन्हा एकदा मुलांच्या बरोबर मी लहान झाले . गारा वेचत व नाव पाण्यात सोडत आई पण विसरून किशोरी झाले .जोरात तुषार शिंपडून हसलास ना खुशीत?

शीळ घालत,सायकल वर स्वार होऊन तू माझ्या मुलांच्या सवे घरात येऊ लागलास. मी हातात टॉवेल तयार ठेवू लागले . पण जुन्या आठवणीने ओठांच्या कोपर्‍यात किंचित आलेले हसू तू अचूक हेरलेस ना?

मोठे डोळे करून मुलांना दटावत असे मी! पण लेक्चर चुकवून मैत्रिणींच्या बरोबर तुझ्या तालात केलेली झिबांड झिम्मड झिम्म्याने मनात फेर धरलाच रे!

आता मात्र तू येतोस सुंठ,आलं,काढ्याचा वास घेऊन ! तुझ्या आगमनाची वर्दी देत मातीचा दरवळ येतो. .  . मी मात्र घरात काढ्याचे साहित्य आहे ना याची खात्री करते. तुला अंगाखांद्यावर घेऊन चिंब भिजावसं वाटतं पण तुझ्या सरींबरोबर मनातल्या मनातच फुगडी घालते.

कानटोपी चढवून, शाल गुंडाळून बाल्कनीतून ,खिडकीतून तुला न्याहळत राहते. थरथणारे हात बाहेर काढून ओंजळीत तुला साठवते.

गारांना घेऊन थाडथाड पावले वाजवत येणार्‍या किंवा सरसर धुंदीत येणार्‍या तुझ्या रुपापेक्षा संथगतीने येणारं तुझं म्हातारं रुपच आपलसं वाटू लागलय हल्ली. . . . .

 

© सौ. दीपा नारायण पुजारी

१२/७/२०२०

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संत सेना महाराज पुण्यतिथी – संत सेना महाराज ☆ प्रा. विजय जंगम

⭐ विविधा ⭐

⭐ संत सेना महाराज पुण्यतिथी – संत सेना महाराज ⭐  प्रा. विजय जंगम⭐ 

महाराष्ट्रातील थोर संत परंपरेत संत सेना महाराजांचं नाव आदराने घेतले जाते. कारण, अंधार युगात ज्या ज्या संतांनी जातीभेदाच्या, वर्ण व्यवस्थेच्या , लिंगभेदाच्या विरूद्ध उद्बोधन करून आधुनिक महाराष्ट्र घडविण्याचं काम केलं , त्यांच्या मध्ये संत सेना महाराजांचा वाटाही मोठा आहे.त्या काळी , संतांनी आपल्या व्यापक विचारांनी भरकटलेल्या समाजाला स्वतः दीपस्तंभ होऊन भक्ती मार्गातून मानव मुक्तीचा मार्ग दाखविला आणि, समाजात समते बरोबरच समानताही निर्माण करण्याचं फार मोठं काम संतांनी महाराष्ट्रात केलं.

मध्य प्रदेशातील रेवा संस्थान. त्याला रेवा खंड म्हणत असत. त्या खंडातील बांधवगड येथे देवीदास आणि प्रेम कुंवर बाई यांचे पोटी , विक्रम संवत १३५७ , इ.स.१३०१ , वैशाख वद्य द्वादशी ,वार रविवार रोजी संत सेनांजीचा जन्म झाला.जन्मत: च बाळ खूपच तेजस्वी. म्हणून त्याचे नाव सेना किंवा सैन असे ठेवले.सैन म्हणजे तेज: पुंज , प्रकाशमान . सेनाजी म्हणजे भीष्माचार्यांचा अवतार असे समजले जाते. कारण, भावी काळात परोपकारी, वचन निष्ठ , प्रतिज्ञा बध्द आणि पराक्रमी असेच त्यांचे जीवन चरित्र दिसून येते.
देवीदास आणि प्रेम कुंवर बाई हे दोघेही धार्मिक आणि साधू संतांची सेवा करणारे एक आदर्श जोडपे होते.त्यामुळे ,सेनाजी्वर बालपणापासूनच चांगले संस्कार झाले.त्यांना साधू संतांचा संग लाभला. त्यांच्या बुद्धीची चमक, त्यांचा चांगुलपणा , धर्म ज्ञान आणि सेवा तत्परता तेव्हा पासूनच दिसू लागली.

त्याकाळी बांधवगड येथे वाघेला वंशाचा रामसिंह राजा राज्य करीत होता.त्याचे दरबारी देवीदास हे सन्मानीय न्हावी होते.देवीदास आणि सेना या दोघांचेही रामानंद हे गुरू होते. ते पुरोगामी विचारांचे असल्याने , सेनाजी पुरोगामी विचारांचेच घडले. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, महाराष्ट्रातील निवृत्ती, ज्ञानदेव, स़ोपान आणि मुक्ताबाई यांचे वडील विठ्ठलपंत हे देवीदासचे गुरू बंधू.त्यानी सेनाजींना महाराष्ट्रात जायची आज्ञा केली.

देवीदासच्या पश्चात राजदरबारातील सेवा सेनाजी कडे आली , मात्र ते त्यात रमले नाहीत.त्याना विठ्ठलाचा साक्षात्कार झाला आणि ते पंढरपुरात दाखल झाले. तेथे संत नामदेव, सावता माळी, गोरा कुंभार, चोखामेळा या संतांचा सहवास लाभला.विठ्ठलाच्या दर्शनाने ते भारावून गेले.ज्ञानदेवादी चारी भावंडांनी समाधी घेतल्याने त्यांचा विरस झाला.ते आळंदीला गेले.तेथे अनेक अभंग रचना केल्या. ज्ञानदेवांच्या चरणी त्या वाहिल्या.

सेना महाराजाना हिंदी, मराठी, पंजाबी , राजस्थानी भाषा येत होत्या. त्यांचे भाषेवर प्रभुत्व होते.गळा गोड होता. त्यांनी व्यसनाधीनता , बदफैली यावर रचना केल्या. ” गांजा भांग अफू घेऊ नका सूरा / “त्याच प्रमाणे आपल्या जातीचाही त्यांनी उल्लेख केला आहे.” न्हावीयाचे वंशी / जन्म दिला ऋषीकशी / ”

नामदेवांच्या समाधी नंतर सेनाजी उत्तर भारताकडे गेले. तेथून बांधव गड . तेथे सर्वांना आशीर्वाद देऊन ते आपल्या जन्म ठिकाणी समाधिस्थ झाले. महाराष्ट्रा बाहेरचे सेना महाराष्ट्रात आपला ठसा उमटवून अजरामर झाले.

© प्रा. विजय जंगम 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बुरी नजरवाले तेरा मुॅंह काला ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ बुरी नजरवाले तेरा मुह काला ☆ श्री अरविंद लिमये ☆

मुल़-मुली बाहेरुन खेळून तिन्हीसांजेला घरी परत आली की त्यांची किंवा घरातल्या तान्ह्या बाळांचीही पूर्वी मीठ-मोहऱ्या ओवाळून ‘दृष्ट’ काढली जायची. परगावाहून घरी आलेल्या मुली-सुनांना उंबऱ्यातच थांबवून त्यांच्या पायांवर पाणी घालून,त्यांच्यावरुन भाकरतुकडा ओवाळून टाकला जायचा आणि मगच त्यांना घरात घेतलं जायचं. बाहेरची इडापिडा बाहेरच रहावी,ती त्यांच्यासोबत आंत येऊ नये,त्यांचा त्यांना त्रास होऊ नये ही भावना असलेल्या आणि रुढींनी शिक्कामोर्तब केलेल्या या परंपरा..! जुनं ते सगळं निरर्थक, त्याज्य, अवैज्ञानिक,तथ्यहीन म्हणून हे बऱ्याच प्रमाणात आता कालबाह्य झालेलं आहे.तरीही बराच काळ उलटून गेल्यावर मानसशास्त्राच्या अभ्यासांतर्गत झालेल्या विविध संशोधनातून Negative आणि Positive waves चे आपल्या आरोग्यावर,स्वास्थ्यावर होणारे परिणाम ठळकपणे अधोरेखित होऊन स्विकारले गेल्यानंतर मात्र आपल्या भारतीय संस्कृतीतल्या वर उल्लेख केलेल्या आणि आज निरर्थक वाटणाऱ्या प्रथा-परंपरांमागचं विज्ञान नव्याने जाणवतं आणि त्या त्या प्रथा तथ्यहीन नसल्याचं आपल्या लक्षात येतं.

या ‘दृष्ट’ काढण्याच्या संकल्पनेतील ‘दृष्ट’ या शब्दाचा ‘दृष्टी’ याअर्थी थेट संबंध ‘वाईट नजरे’शीच आहे.वाईट नजरेतली  पूर्वी गृहित धरली गेलेली इडा-पिडा म्हणजेच आजच्या विज्ञानाचं समर्थन मिळालेल्या ‘Negative-waves’च. ‘बुरी नजरवाले तेरा मुॅंह काला’ या उक्तीमधे वाईट नजरेचा तिरस्कार ओतप्रोत भरलेला आहे तो यासाठीच.मग या Negative waves घराबाहेर काढून टाकण्यासाठी मीठ-मोहऱ्याच का? यामागेही कांही शास्त्र (म्हणजेच विज्ञान) असणारच. आज अशा कोडी बनून राहिलेल्या आपल्या संस्कृतीतील अनेक परंपरांमागचं विज्ञान जाणून घेण्याचं औत्सुक्यच त्या कोड्या़मधे लपलेलं रहस्य शोधायला आपल्याला उद्युक्त करणारं ठरेल.

इतर चार ज्ञानेंद्रियांच्या तुलनेत आपल्या पंचज्ञानेंद्रियांमधील ‘डोळे’ या ज्ञानेन्द्रियाची खास वैशिष्ट्ये आहेत.डोळ्यांचं वर्णन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशेषणांचे असंख्य अलंकार इतर चार ज्ञानेंद्रियांच्या वाट्याला तितक्या प्रमाणात येत नाहीत म्हणून मला ‘डोळे’ वैशिष्टयपूर्ण वाटतात.बघा ना.डोळ्यांसाठी आपण त्यातील भावछटांनुसार किती विविध विशेषणे वापरतो.

डोळे टपोरे असतात.हसरे असतात. डोळे बोलके असतात. खोडकर असतात. तेजस्वी असतात किंवा विझलेले सुध्दा.ते उत्सुक असतात. निराशही कधीकधी. प्रेमळ असतात,तसेच जुलमी न् अधाशीही..!

खरंतर डोळे हे डोळेच असतात.ही जी असंख्य विशेषणं आपण डोळ्यांचे वर्णन करायला म्हणून वापरतो त्यांचे खरे हकदार डोळे नसतातच. खरी हकदार असते त्या डोळ्यांमधली नजर..! डोळे हे या नजरांचे वाहक असतात फक्त.मनातल्या या विविध भावना नि:शब्दपणे तरीही अचूक व्यक्त करत असते ती नजरच.लटका राग असो वा टोकाचा संताप.समाधान,आनंद असो किंवा दुःख, वेदना,घुसमट असो वेळोवेळी या सगळ्या भावना नजरेतून आधी डोळ्यांत उमटतात,मग चेहर्‍यावर पसरतात आणि नंतर शब्दांतून व्यक्त होतात.भावनेच्या तीव्रतेमुळे क्वचित कधी शब्द मुकेच राहिले तरीही नजरेतून व्यक्त होणाऱ्या या भावना त्यांच्या कमी-अधिक तीव्रतेनुसार पाहणाऱ्यापर्यंत           ‘शब्देविण संवाद ‘ साधत अचूक पोचतातच.

या भावना तशा हानीकारक नसतात. याला अपवाद अर्थातच अधाशी डोळ्यांचा. नजरेतल्या अधाशीपणाचा. वरवर विचार केला तर अधाशीपणातून पोटातली भूक व्यक्त होते असा समज आहे. पण मला वाटतं की भुकेलेपण आणि अधाशीपण यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. कारण भुकेल्या नजरेत एक प्रकारची अगतिकता असते. व्याकुळता असते. अधाशी नजरेत याचा लवलेशही नसतो. असते फक्त अतृप्ती. अधाशी पणात काठोकाठ भरलेला असतो तो फक्त हव्यास. तिथं ‘आणखी हवं’ ला अंतच नसतो.

अधाशीपणातली भूक अन्नाचीही असते पण फक्त अन्नाचीच नसते.भूक अनेक प्रकारची असू शकते. पैशाची असते, यशाची असते, प्रतिष्ठेची असते, सौंदर्याची असते किंवा वासनेने अंध झालेल्या मनातल्या उपभोगांचीही असते..!

हव्यास आणि अतृप्ती हे अशा अधाशीपणाच्या विकृतीतले समान धागे. अधाशीपण खाण्याच्या बाबतीतलं असेल तर कितीही खाल्लं, पोट भरलं तरी तृप्ती नसतेच. असते अतृप्तीच.तसंच भूक पैशाची असेल तर कितीही पैसा मिळाला तरी समाधान नसते. आपल्यापेक्षा अधिक पैसा मिळणाऱ्यांबद्दल हेवाच असतो मनात.हेच कोणत्याही प्रकारच्या भूकेबाबतचं समान वास्तवच.

अधाशीपणा लालसेने लडबडलेला असतो. तिथे अतृप्तीत भिजलेली वखवख असते फक्त ! हा हव्यास, ही  वखवख अधाशी डोळ्यांमधे ठासून भरलेली असते.ती लपूच शकत नाही. ही अधाशी डोळ्यांमधली नजरच ‘दृष्ट’ लावणारी असते. हे दृष्ट लागणं म्हणजेच इडा-पिडांच्या काळ्या सावल्या..! अधाशी डोळ्यांचं हे लागटपण म्हणजे Negative waves चे वहानच.आणि ‘दृष्ट काढणं’ हा त्यावरचा मानसिक निश्चिंतता देणारा बुऱ्या नजरेवरचा उतारा..!!

 

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – दाढी !☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? दाढी ! ! ?

First impression is…….

लेखाची सुरवात अशी एखाद्या अर्धवट सोडलेल्या इंग्रजी वाक्प्रचाराने केली की वाचकांवर इंप्रेशन पडतं, असं जाणकार म्हणतात ! खरं खोटं तेच जाणोत ! असो ! मी आत्तापर्यंतच्या माझ्या सगळ्या लेखांची सुरवात मराठीतूनच केलेली आहे हे आपल्याला (ते लेख वाचले असतील तर!?) आठवत असेलच आणि हा माझा पहिलाच असा लेख आहे, की ज्याची सुरवात मी इंग्रजीतून केली आहे ! आता ती इंग्रजीतून केली आहे याच महत्वाचं कारण म्हणजे आजचा विषय, जो पुरुषांच्या जास्त जवळचा म्हणजेच दाढी, शेव्ह आणि “शेवेचा” विषय बायकांचा ! तसा “शेवेचा” उपयोग पुरुषांना ती खाण्यासाठी पण होतोच, यात वाद नाही पण “शेव” या शब्दात मी श्लेष साधलाय, हे चाणक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच !  त्यामुळे आजच्या लेखाची सुरवात मी इंग्रजीतून केल्ये हे बरोबरच आहे, हे आपण दाढी खाजवत (वाढली असेल तर) जाणकारां प्रमाणे (नसलात तरी) मान्य करायला हरकत नाही ! समजा, जर अखिल भारतीय केश कर्तनालयाचा प्रवक्ता “रोज दाढी करण्याचे फायदे” या विषयावर स्वतः अर्धा अर्धा इंच दाढीचे खुंट ठेवून बोलायला उभा राहिला, तर त्याच्या बोलण्यावर पब्लिक विश्वास तरी ठेवेल का ? म्हणूनच मी सुरवातीला असा अनेक वेळा घासून गुळगुळीत झालेला इंग्रजी वाक्प्रचार ठेवून दिला ! त्यामुळे अशा इंग्रजी वाक्प्रचाराने लेखाची सुरवात करून, उगाचच मी आपल्यावर इंप्रेशन मारतोय, हा आपल्या मनांत माझ्याविषयी झालेला गैरसमज कृपया आपण काढून टाकाल अशी मला आशा आहे ! तर, पुनः एकदा असो !

मुलांना वयात आल्यावर जसे त्यांच्या अकलेला (मुळात असेल तरच) धुमारे फुटायला लागतात, तसेच त्यांच्या गालावर, ओठांवर, हनुवठीवर बारीक बारीक केसांचे धुमारे फुटायला लागतात ! या दोन्ही धुमाऱ्यात फरक असा, की अकलेचे धुमारे फुटलेत हे त्याला, “जास्त अकलेचे दिवे पाजळू नकोस!” हा डायलॉग कधीतरी वडीलधाऱ्याकडून ऐकल्यावर कळतं आणि गालावरचे किंवा ओठावरचे धुमारे तसे दृगोचर असल्यामुळे तो मुलगा वयात आलाय हे इतर लोकांना कळतं !

माझ्या पिढीत, तारुण्यात पदार्पण करायच मुलांच वय साधारण सोळा ते अठरा होते.  हल्लीच्या (कली) युगात ते आणखीन खाली आलंय असं म्हणतात ! याची कारणं काय आहेत ? यावर दाढी खाजवता खाजवता उहापोह करायचा म्हटला, तरी या विषयातील विद्वजनांचे एक चर्चासत्र नक्कीच होईल ! एवढच कशाला, या विषयावर माने पर्यंत केस असलेला आणि आपल्या पांढऱ्या काळ्या (का काळ्या पांढऱ्या ?) दाढी मिशांनी आणि त्याच रंगाच्या जाड जाड केसांच्या भुवयांनी, आपला अर्ध्याहून अधिक चेहरा झाकला गेलाय असा विद्वान, मनांत आणेल तर भला मोठा प्रबंध नक्कीच खरडेल !

मी तरुण (शरीराने?) असतांना आमच्यातला एखादा उंटावरचा शहाणा मित्र, गप्पा मारता मारता “आपण बुवा नोकरी बिकरी करणार नाही तुमच्या सारखी, एक सॉलिड धंद्याची आयडिया आहे आपल्या डोक्यात !” असं त्या गप्पांच्या ओघात आम्हाला ऐकवायचा. मग त्या वर आमच्यापैकीच कोणीतरी एक मित्र त्याला, “खिशात नाही दाढी करायला दीड रुपया आणि गोष्टी करतोय दीड लाखाच्या !” असं ऐकवून त्याची टर उडवायचा आणि आम्ही बाकीचे त्यात सामील व्हायचो ! मंडळी, तेव्हा दाढी करायला सलून मधे खरोखरचं चक्क दीड रुपया पडत होता आणि दीड लाखात एक छोटासा का होईना, पण स्वतःचा व्यवसाय सुरु करता येत होता, आहात कुठे !

आमच्या काळी कॉलेजला जाणारे सगळे तरुण, स्वतःला त्या काळातल्या  सिनेमातील अनेक “कुमारां” पैकी आपण एक आहोत, अशा चुकीच्या समजूतीतून पोरींवर इंप्रेशन मारायला, रोज गुळगुळीत दाढी करून कॉलेजला येत असत. त्या कुमारां पैकी जमतेम 2-3 टक्के कुमारांच सूत, स्वतःला कोणीतरी “कुमारी” अथवा “बाला” समजणाऱ्या बालिकांशी जमे आणि बाकीचे सगळे रोजचा दाढीचा खर्च वाचवून, त्या पैशातून “चार मिनार” नाहीतर “पनामा” पिऊन, मजनू बनून फिरत ! तसं बघायला गेलं तर, अस्ताव्यस्त वाढलेली दाढी ही तेंव्हा तशी प्रेमभंग झाल्याची एक निशाणी होतीच, पण त्याच्या जोडीला, जर त्या मजनूच्या तोंडात वरील दोन पैकी कुठली सिगरेट असेल तर, त्याच्या मजनूपणावर आम्ही तेंव्हा शिक्कामोर्तब करत असू आणि जमलं तर अशा मजनू पासून शक्यतो चार हात लांबच कसं राहता येईल याचा विचार डोक्यात चालत असे ! त्याच एक कारण म्हणजे, उगाच कोणा “कुमारी” अथवा “बालाचे” आमच्या बाबतीत चांगले असलेले इंप्रेशन, खराब व्हायला नको म्हणून !

बैरागी बुवा किंवा एकुणात बुवा मंडळींना ओळखायचा एक सोपा मार्ग म्हणजे त्यांची वाढलेली दाढी ! तसं बघायला गेलं तर तो अशा लोकांचा “ट्रेड मार्कच” म्हणायला हवा ! पण हल्लीच्या कलियुगात वावरणाऱ्या आधुनिक “महाराज” आणि “बुवा” लोकांनी या भरघोस दाढीचा त्याग केलेला आपल्याला पहिला मिळेल ! त्याची कारण काय असतील ती असोत बापडी, पण मला विचाराल तर, प्रत्येक बुवांनी किंवा महाराजांनी दाढी ठेवणं खरच त्यांच्या हिताचं आहे, असं आपलं मला त्यांच्याच हितापोटी वाटतं ! म्हणजे कसं आहे ना, एखाद्या भक्ताने अशा बुवांना किंवा महाराजांना काही अवघड प्रश्न विचारून त्यांची पंचाईत केली, तर निदान दाढीवर हात फिरवून विचारात असल्याचे तरी भासवता येईल नां ? म्हणजे होईल काय, “बुडत्याला काडीचा आधार” या जुन्या म्हणीच्या जोडीला, मी तयार केलेली “बुवाला दाढीचा आधार” या नवीन म्हणीचा उद्गगाता म्हणून माझं नांव इतिहासात दर्ज व्हायला मदत तरी होईल! या माझ्या विधानाशी तुम्ही असलेली, नसलेली स्वतःची दाढी खाजवत सहमत व्हाल, अशी मी माझी स्वतःची “बुलगानीन” दाढी खाजवत आशा करतो !

जगात चांगली आणि वाईट अशी अनेक प्रकारची व्यसनं अस्तित्वात आहेत यात दुमत असण्याचं कारण नाही. आणि प्रत्येक प्राणीमात्र स्वतःला आवडणारी आणि कधीतरी खिशाला न परवडणारी व्यसनं सुद्धा आपापल्या परीने करत असतो आणि त्यात रमत असतो ! पण काही काही लोकांना दिवसातून तीन तीन वेळा दाढी करण्याचं व्यसन असतं आणि अशी माणसं माझ्या प्रमाणे तुमच्या पण पाहण्यात नक्कीच आली असतील ! या लोकांना ओळखायची एक सोप्पी पद्धत म्हणजे, त्या लोकांच्या गालांचा रंगच सततच्या ब्लेडच्या खरवडण्याने, बदलून चक्क हिरवा काळा झालेला असतो ! आता हे लोकं आपली दाढी दिवसातून तीन तीन वेळेस करून, कुणा कुणाला ती “टोचू” नये याची इतकी काळजी का घेतात, ते त्यांचे त्यांनाच माहित ! आपण उगाच कशाला त्यांच्या भानगडीत आपली दाढी, सॉरी नाक खुपसा !

काही काही अवलिया लोकांना, इतिहासात होऊन गेलेल्या पराक्रमी विरां प्रमाणे, आपल्या दाढी मिशीचा कट ठेवायला आवडतो ! अर्थात असे फक्त “दाढी मिशी वीर” खऱ्या आयुष्यात किती आणि कुठली विरता गाजवत असतील हा एक संशोधनाचा विषय होईल ! त्यांना त्यांच्या दाढी मिशीचा कट लखलाभ !

शेवटी, आपल्या सर्वांनाच, आपले स्वतःचे कुठलेही काम दुसऱ्याकडून वेळेवर करून घेण्यासाठी, (ते काम करणारा पुरुष असेल आणि त्याला दाढी असेल तर) त्याची दाढी कुरवाळायची वेळ येऊ देऊ नकोस, हिच त्या जगतनियंत्याच्या चरणी माझी प्रार्थना !

शुभं भवतु ! ?

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आयुष्याचे धडे गिरवताना… ☆ सौ .कल्पना कुंभार

सौ .कल्पना कुंभार

? विविधा  ?

☆ आयुष्याचे धडे गिरवताना…☆ सौ .कल्पना कुंभार ☆

आयुष्याचे धडे गिरवताना…

खरं आयुष्य उमगत गेलं…

    –  सौ.कल्पना कुंभार..

आपल्या आयुष्यात असे काही क्षण येतात ज्यामुळे कळत नकळत आपली जीवनाकडे पहाण्याची दृष्टीच बदलून जाते..काही व्यक्ती ,काही प्रसंग ,काही चित्रपट, नाटकं तर काही पुस्तक आपल्याला आयुष्य कसं जगावं ..? याचा धडाच देतात व जगणंच बदलून टाकतात..

एकदा  लहानपणी दुसरी तिसरीला असताना मी माझ्या कुटुंबियांसोबत आमच्या गावी गेले होते. तेथे गेल्यावर दुसऱ्याच दिवशी मम्मी पहाटे लवकर उठली व गोठ्यात गेली..मलाही जाग आली होती म्हणून मीही गेले मागून.. तिने गोठा स्वच्छ केला व म्हशीची धारही काढली.. मी सगळं पहात तेथेच बसले होते..मी मम्मीला म्हणाले, ” मम्मी, तुला घाण वाटत नाही का ग गोठ्यात..?मला तर खूप वास येतोय व शेण बघून कसतरीच होतय..आणि तुला दूध काढायला कसं येत ग..?तुला भीती नाही वाटली म्हशींची.??”

मम्मी म्हणाली, ” अग जस आपण आपलं घर स्वच्छ करतो तस हे म्हशीच घरच आहे..आणि   तुला एक सांगू ..नेहमी लक्षात ठेव ..माणसानं वाईट काम करताना लाज बाळगावी ..चांगलं काम करताना नाही..मी गोठा स्वच्छ केला कारण ते स्वच्छ राहिले तर जनावरांच आरोग्य चांगलं राहील व आपलंही…”

मी पुन्हा म्हणाले, ” मम्मी , पण तू तर खूप शिकलेस ..शिक्षिका आहेस..मग असलं का काम करायचं..?” मम्मी हसली व म्हणाली , ” बाळ,कोणतंही काम लहान मोठं नसत ग..आणि आपण खूप शिकलो तरी आपल्या काही गरजा भागविण्यासाठी काम करावेच लागते ..आणि कष्टाच काम करण्यात लाज कसली..? ज्या कामामुळे आपले ,आपल्या कुटुंबाचे व समाजाचे नुकसान होईल ते काम करायला लाजावे..”

त्यावेळची ही घटना मला खूप काही शिकवून गेली.. आणि आयुष्यभर लक्षात ही राहिली..कोणतंही काम कमी दर्जाचं नसत..त्यामागचे कष्ट व प्रामाणिक हेतू महत्वाचा..मग अस कष्टाचं काम करायला लाजायच कशाला..??आपण जीवनात कितीही शिकलो..खूप पैसा मिळवला तरी मातीशी पाय घट्ट रोवून उभं रहायचं..हे मी नकळत शिकले..

माझ्या लहानपणापासून च मला माझ्या पणजोबा व पणजी चा सहवास लाभला..त्यांना एकच लेक..ती म्हणजे पप्पांची आई.. त्यामुळे त्यांना संभाळणार कोण..?असा जेंव्हा प्रश्न निर्माण झाला तेंव्हा पप्पा त्याना इचलकरंजी ला घेऊन आले..पणजी मी लहान असतानाच गेली पण माझे पणजोबा..आम्ही बाबा म्हणायचो त्यांना..खूप प्रेमळ पण तेव्हढेच कडक स्वभावाचे..उंच,धिप्पाड शरीरयष्टी.. जणू पैलवानच..सगळेच घाबरायचे त्यांना..सगळं वेळेत लागायचं त्यांना..मम्मी शाळेच्या गडबडीतही खूप छान सांभाळायची त्यांचा स्वभाव..कधीच चिडलेल किंवा आदळआपट केलेलं पाहिलं नाही  मी तिला…

एकदा बाबा आजारी होते..उठताही येत नव्हतं..सगळ्या चादरी ही घाण झाल्या होत्या.. त्यांनाच सांगताना लाज वाटत होती . पण माझ्या पप्पानी व मम्मीने कसलीही तक्रार न करता..ते शी व शु च सगळं स्वच्छ तर केलंच..मम्मी ने बाबा ना आंघोळही घातली..बाबांचेच डोळे पाणावलेले मी पाहिले त्यावेळी.. नंतर मी व दादाने त्या दोघांना विचारले, ” तुम्हाला शी काढताना घाण नाही वाटली..?” पप्पा म्हणाले, ” त्यांनी मी लहान असताना माझी पण शी काढलीच होती..त्यांना कधी घाण वाटलं नाही..मग मला कसं वाटेल..आणि माणूस जसजसा म्हातारा होतो ना..तसा तो लहान मुलांप्रमाणे वागायला लागतो..मग आपल्याला मोठं व्हाव लागतं.. कोणीही समोर असू दे..त्याच्या वेळेला पडताना नेहमी मन स्वच्छ ठेवायचं..कशाला घाण नाही म्हणायचं..हेच जगणं आहे बाळांनो…” आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी ..पप्पा व मम्मी दोघेही शाळेला गेल्यावर..पप्पांच्या प्रमाणेच माझ्या दादालाही बाबांची शी काढताना पाहिलं..आणि हा प्रसंग मनावर कोरला गेला..दोन वर्षांपूर्वी जेंव्हा माझे सासरे आजारी पडले तेंव्हा मलाही त्यांचं सगळं करताना अजिबात घाण वाटलं नाही..आणि माझ्या बाबांच्या डोळ्यात जस पाणी होतं तसच पाणी मला माझ्या  आहोंच्या डोळ्यांत त्यावेळी दिसलं… माझ्या मुलांसाठीही कदाचित आयुष्यातील तो एक धडाच होता…

या lockdown मध्ये जेंव्हा मी आजारी पडले तेंव्हा माझ्या दहावी मध्ये असलेल्या लेकाने कपडे मशीन मध्ये धुऊन उन्हात वाळत घालण्यापासून ते मला ताट वाढून हातात देण्यापर्यंत न लाजता काम केले . मला भावनिक आधारही दिला..तेंव्हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कार कसे पाझरत जातात  हे समजलं..या कोरोनाच्या काळातही आजी आजोबांचं ऑक्सिजन रोज जेंव्हा माझी लेक चेक करायची तेंव्हा त्यांच्या डोळ्यांतील अभिमान माझ्याही डोळ्यांत उतरत होता..

आज आयुष्याचा धडा गिरवताना या विषयाबद्दल विचार करताना मला आणखी एक प्रसंग तुम्हा सर्वांना सांगू वाटतो..

मी बीए करत होते..त्या रात्री पप्पाना एकदम अस्वस्थ वाटू लागलं..श्वास घेताना त्रास होऊ लागला..तेंव्हा दादाने त्याना life line ला ऍडमिट केलं..त्यांना हार्ट अटॅक आला होता..कसलंस इंजेक्शन ही दिलं डॉक्टरनी.. दादा त्यावेळी MD करत होता. पप्पाना ICU मध्ये ऍडमिट करून दोनच दिवस झाले होते आणि…मम्मीची आई..माझी आजी हार्ट ऍटॅक ने गेली.. गावाकडून फोन आला रात्री..मला तर काहीच समजेना..काय करावे..दादा दवाखान्यात थांबला होता.. त्याने गाडी ठरवली व मम्मी व तिच्या मैत्रीणीला सोबत म्हणून गावी पाठवलं.. सगळं आवरून मम्मी पहाटे परत आली..आणि माझ्या गळ्यात पडून खूप रडली….सहा वाजले होते..न झोपता आवरून नाश्ता व चहा घेऊन लगेच   सात वाजता ती दवाखान्यात पप्पांसमोर हजर होती..जणू काही झालंच नाही..हसत सगळं  करत होती..स्वतः च दुःख बाजूला सारून पप्पांच्या विनोदावर तिला हसताना बघून मला मात्र खूप रडू येत होतं..पण कसं काय मलाही माहीत नाही..मीही खंबीर होत गेले.. त्यानंतर पप्पांची बायपास सर्जरी झाली जी खूप क्रिटिकल होती..देवाची कृपाच ती सर्जरी यशस्वी झाली..पण पप्पांची तब्बेत खूपच नाजूक झाली होती.. कोणताही मानसिक ताणतणाव त्यांना द्यायचा नाही असं डॉक्टरनी सांगितलं त्यामुळे पप्पांपासून ही घटना आम्ही एक वर्षभर लपवली.. त्यासाठी किती खोटं बोलावं लागलं..हे सांगताच येणार नाही मला.. घराच गेट वाजलं की बाहेर पळत जायचं..येणाऱ्या व्यक्तीला आजींचा विषय काढू नका असं तिथेच सांगून घरात घायच असं मी जवळजवळ वर्षभर केलं..या घटनेने मला शिकवलं ..आपलं दुःख कितीही मोठं असलं तरी एखादयाच्या जिवापेक्षा मोठं काहीच नाही…..

खरच असे कितीतरी प्रसंग , व्यक्ती किंवा क्षण आपल्या आयुष्यात हे येतच असतात..पण त्यातून नेमकं काय वेचायच हे ज्याचं त्यानं ठरवायचं..पण हेही तितकंच खरं त्या घटना चांगल्या असो किंवा वाईट ..शिकवून जातात बरच काही..आणि आयुष्याच्या पुस्तकातील एक धडा बनून नेंहमीच मार्गदर्शन करत रहातात …आपलं कुटुंब हे एका स्वच्छ, नितळ, गोड पाण्याच्या झऱ्यासारखं आहे..झरा जसा पुढे पुढे जाताना ही आपली खरी चव सोडत नाही..तसच आपलं आयुष्य ही असच  वाहत असत..त्यामध्ये कुठेही वाईट विचार मिसळले जाणार नाहीत यासाठी पालकांनी सजग ..जागरूक रहाणं महत्वाचं..कुटुंबात रुजलेले संस्कार हे समाजासाठी नक्कीच उपयोगी पडतात..कळत नकळत आपण इतरांना जपू लागतो.. त्यांना मदत करू लागतो..पण हे तेंव्हाच होतं जेंव्हा एखादं कुटुंब संस्काराच्या भरभक्कम पायावर उभं असत..

कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी म्हटलच आहे….

सांगा कसं जगायचं..??

 कण्हत कण्हत की गाणं म्हणत

तुम्हीच ठरवा…

 

दुवा देत हसायचं की शिव्या देत रडायचं

तुम्हीच ठरवा..कसं जगायचं..??

 

पेला अर्धा भरला आहे असं देखील म्हणता येत..

पेला अर्धा सरला आहे असं देखील म्हणता येत

मग भरला आहे म्हणायचं

की सरला आहे म्हणायचं..

तुम्हीच ठरवा..

सांगा कसं जगायचं..??

 

© सौ .कल्पना कुंभार

इचलकरंजी

मोबाईल नंबर:: 9822038378

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कृष्णा-(दहीकाल्याच्या निमित्ताने….) ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ ☆ कृष्णा-(दहीकाल्याच्या निमित्ताने…) ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

कृष्णा, बंदिवासातून स्वातंत्र्याकडे तुझी वाटचाल काल रात्रीपासून सुरू झाली! कंसाच्या बंदिवासात देवकीच्या पोटी जन्माला येताच, दुसऱ्या क्षणी तुला तिथून स्थलांतर करावे लागले! विष्णू अवतारातील एक म्हणून पृथ्वीवर जन्माला आल्या बरोबरच तुला इथले मानवी जीवनाचे वनवास भोगावे लागले आणि गोकुळात जाऊन तू साधा गोपाल म्हणून जगलास ! इतर गोकुळवासी मित्रांबरोबर तुझे खेळ रंगले पण ते करता करताच तू किती राक्षसांचे पारिपत्य केलेस आणि दुष्टांच्या निर्दालनासाठी असलेला तुझा मानवी अवतार कार्यरत झाला ! गरीब बिचाऱ्या गोपांना घरचे दूध,दही, लोणी मिळत नाही म्हणून गोपींची मडकी फोडली. सर्वांसोबत त्यांच्या दही काल्यात रंंगून गेलास आणि समाजवादाचा एक धडा शिकवलास! जे आहे ते सर्वांनी वाटून घ्यायचं !थोडा मोठा झाल्यावर  सांदिपनी ऋषींच्या आश्रमात शिकण्यासाठी गेलास! तेथे गरीब सुदाम्याशी मैत्रीचे बंध ठेवून पुढील काळात त्याचा उद्धार केलास! किशोरावस्था संपून मोठा झालास आणि कंसाचा वध करून मथुऱेचे राज्य मिळवलेस !

 तारुण्यसुलभ भावनेने स्वयंवरासाठी गेलास ,तुला द्रौपदीची आस होती पण पुढे काय घडणार याचे दृश्यरूप बहुदा तुला दिसले असावे!त्यामुळे पांडवांच्या पदरी द्रौपदी देऊन तू तिचा सखा बनलास !दुर्गा भागवत म्हणतात की मित्र या नात्याला ‘सखा ‘हे रूप देऊन स्त्री-पुरुषातील  हे नाते तू अधिक उदात्त केलेस ! आयुष्यभर पांडवांची साथ देत कौरव-पांडव युद्धात तू अर्जुनाचा सारथी बनून कुरुक्षेत्रावर उतरलास योद्धा म्हणून नाही तर   सारथी बनून !एक सहज विचार मनात आला, द्रौपदीने कर्णाला ‘ सूतपुत्र ‘म्हणून नाकारले!सारथ्य करणारा माणूस समाजात खालच्या स्तरावर  असतो हे तिने दाखवून दिले पण शेवटी युद्धात तू सारथी बनून जी  पांडवांना मदत केलीस त्यातून तू सारथी हा सुद्धा किती महत्वाचा असतो हे  द्रौपदीला दाखवून  दिलंस का? तुझं सगळं अस्तित्वच  देवरूप  आणि  मानव  रूप यांच्या सीमेवर होतं!  जन्म घेतलास त्यात तू त्याच रंगाचा रंगून गेलास! मगध देशाच्या लढायांना कंटाळून तू गोकुळ मथुरा सोडून  द्वारकेला पळून गेलास आणि स्वतंत्र राज्य स्थापन केलंस म्हणून तुला रणछोडदास नाव मिळालं! वेगवेगळ्या राज्यातील राजकन्याशी विवाह करून

तू साऱ्या भरत खंडाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केलास! आणि अवतार कार्य समाप्त करताना एका भिल्लाच्या हातून तुझ्या तळपायाला बाण लागून तुझे जीवन कार्य संपवलेस! कृष्णा, तुझे नाव घेतले की आपोआपच गुणा दोषातून मुक्ती मिळते असं वाटतं !कारण आपण काहीही घडलं तरी ‘कृष्णार्पण’ असा शब्द वापरून ते संपवतो .सगळं हलाहल जणू संपून जातं तुझ्या

स्मरणात! तुझा जन्म काळ मध्यरात्री येतो ,तेव्हाही आम्ही वाजत गाजत तुझा जन्मोत्सव साजरा करतो कारण अंधाराची रात्र संपून तुझ्या जन्माने उत्साहाचा आणि कर्तुत्वाचा जन्म होणार असतो .आजचा गोपाळ काला म्हणजे उत्साही कामाची सुरुवात !पावसाच्या सरी बरोबरच  पुढील वर्ष आनंदात जाऊदे हीच इच्छा! आधुनिकतेच्या नावाखाली कृष्ण – ना किंवा परमेश्वराचे अस्तित्व न माणणारे आता ‘करोना’ पुढे शरणागत झाले आहे आणि आणि त्यावरून विज्ञानाने कितीही मात केली तरी  एक हातचा तुझ्याकडे , परमात्म्याकडे आहे हे मात्र मान्य केले पाहिजे !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ घरात मोठं कुणीतरी पाहिजे हो…! – साभार व्हाट्सएप्प ☆ संग्राहक : सौ. स्मिता पंडित

? विविधा ?

☆ घरात मोठं कुणीतरी पाहिजे हो…! – साभार व्हाट्सएप्प ☆ संग्राहक : सौ. स्मिता पंडित ☆

उद्या ह्याच पायरीवर तुम्ही असणार आहात…!

पूर्वी घरांत उंबरठे आणि मोठी माणसं असायची. त्यामुळे घराचा कारभार मर्यादेत आणि धाकात चालायचा…!

कुठल्याही कार्याचा श्रीगणेशा करण्याआधी घरातील जेष्ठ मंडळीचा सल्ला घेतला जायचा, त्यांच्या अनुभवाचे सर्व विचार करायचे, त्यामुळे घरातील देवघरा नंतर महत्वाचे स्थान म्हणजे घरातील वयस्करांचे होते…!

आताची वास्तविकता पार वेगळी आहे. काळानुसार घरात गुळगुळीत फरश्या बसल्या आणि घरातील सदस्य घराच्या मर्यादा आपआपल्या सोयीने ठरवू लागले.  स्वयंपाकघर  काय अन्  देवघर काय.. सगळीकडे घरभर चपला घालून फिरायला सुरुवात झाली…!

मोठी माणसं नाहीशी होत आहेत त्यामुळे धाक नावाची गोष्ट सुद्धा लोप पावत चालली आहे. मर्यादा, धाक , शिस्त , संस्कृती इत्यादि प्रकारच्या या गोष्टी हल्ली व्हॉट्स ऍप वर सकाळी सकाळी वाचण्यापुरत्या राहिल्या आहेत…!

पूर्वी ह्याच गोष्टी, चालीरीती घरातील मोठी माणसे सांगायची. म्हणून घरात मोठी वयस्कर माणसे पाहिजेत. संध्याकाळी दिवे लावणीला शुभंकरोति – रामरक्षा- आरतीचे स्वर कानावर पडायलाच पाहीजेत. रात्री घरी उशिरा आल्यानंतर काळजीपोटी प्रश्नोउत्तरे झालीच पाहिजेत…!

रात्रीचं उरलेलं अन्न टाकून देण्याऐवजी त्याला फोडणी -तडका देऊन आणखी चविष्ट व चटपटीत बनवून सकाळच्या न्याहरीत वाढणारं कुणीतरी पाहिजे…

मोजून-मापून खर्च कसा करायचा याचे धडे शिकवणारं… चुकलं तिथे रागवायला व कधीतरी तोंड भरून कौतुक करायला…!

घरात कुणीतरी मोठं पाहिजे हो…!

एकाच छताखाली सर्वांना एकत्र पद्धतीत बांधून ठेवणारं, टिव्ही बंद ठेवून सर्वांनी सोबत जेवण कां करावं यामागचं कारण उत्तमरित्या पटवून देणारं, घराबाहेर पडतांना देवापुढचा अंगारा कपाळावर लावणारं, आनंदाच्या वेळी पटकन देवापुढे साखर ठेवणारं, तर संकटाच्या वेळी आपल्यासाठी देवाला पाण्यात ठेवून माळ जपत प्रार्थना करणारं…

खरंच घरात कुणीतरी मोठ पाहिजेच…!

पिकलेले पांढरे केस असू देत की अंधुक झालेली नजर.. आशीर्वाद देताना थरथरणारे हाथ असू देत की सुरकुत्या पडलेलं शरीर..  लिंबू-मिरचीला मानणारे विचार असू देत की कावळ्याच्या शापाला घाबरणारे मन..  एक गोष्ट चार-चार वेळा सांगणारं बडबडं मुख असू दे की कमी ऐकू येणारे कान.. कसं कां असेना पण सांगसवर करणारं …

घरात कुणीतरी मोठं पाहिजेच…!

ज्या झाडाला फळं-फुलं येत नाही त्या झाड़ाला आपण बिनकामी झाड म्हणतो. परंतु ते झाड़ फळ-फुलं जरी देत नसलं तरी निदान सावली तरी देतं.. त्या सावलीसारखीच घरातील मोठी-वयस्कर माणसं असतात…!

त्यांच्या असण्यानेच आपल्याला नकळत खूप आधार होतो. त्यांचे अस्तित्व आपल्यासाठी खुप मोलाचे असते. घरातून बाहेर पडतांना डोकं ठेवून नमस्कार करण्यासाठी घरात ते अनुभवी पाय पाहिजेतंच…!

घरात मोठं कुणीतरी पाहिजेच हो….!

 

✍ साभार – व्हाट्सएप्प  

संग्राहक : सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गोकूळ अष्टमी निमित्त – कृष्णा …… ☆ संग्राहक : सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

? विविधा ?

☆ गोकूळ अष्टमी निमित्त – कृष्णा …… ☆ संग्राहक : सौ. राधिका भांडारकर ☆ 

जन्माष्टमीच्या निमित्ताने वाचलेली, कै. दुर्गा भागवतांनी लिहिलेली ही सर्वोत्तम पोस्ट:

?

कृष्णा,

तुला कसलं संबोधन लावायचं? तू आकाशासारखा वाटतोस मला, आकाश कसं सतत माथ्यावर असतं आपण जिथे जाऊ तिथे सोबत करतं पण त्याचा निळा रंग बोटावर नाही घेता येत…

खरं म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात डोळ्यासमोर येतच नाहीस.. आधी येते ती आकाशाची गडद निळाई आणि मग त्यामागोमाग लहरत येतं एक मोरपीस… तुझं मोरपीस!

तुझ्याइतका मानवी जीवनात मिसळलेला कुठलाच देव नाही बघ! प्रत्येक नातं तू समरसून जगलास आणि वेळ येताच ते नातं त्यागून मोकळाही झालास! कधी परत वळून बघितलंस का रे मागे? तुझ्यामागे त्या माणसांचं काय झालं असेल तुझ्याशिवाय ?

तुझं सगळंच अतर्क्य! तू प्रचलित नियम मोडलेस. जन्म घेतलास वसुदेव देवकीच्या मथुरेत पण वाढलास नंद यशोदेकडे गोकुळात! दहीदुधाच्या चो-या केल्यास, भलत्या वयात गोपिकांची छेड काढलीस. सुदामा, अर्जुन, उद्धव यांचा मित्र तू होतासच पण द्रौपदीचा सुद्धा ‘सखा’ झालास. हे सुंदर नातं तू भारतीय स्त्रीला दिलंस. ‘बाईचा मित्र’ ही संकल्पनाच नव्हती तुझ्याआधी आपल्याकडे, ‘तो’ स्त्रीचा पिता, पती किंवा पुत्र असावा अशी आपली समाज रीत! विवाहित राधेचा प्रियकर झालास. अगदी प्रेमाचं प्रतिक म्हणून नाव घेताना राधेचं नाव तुझ्याआधी येतं.

पुढे अष्टनायिकांचा पती झालास तरी जरासंधाच्या तावडीतून सोडवलेल्या सोळा सहस्र स्त्रीयांना अभय दिलंस. तुझ्यानंतरही अनेक वर्षांनी सूरदासांनी तुझं बालपण त्यांच्या पदांतून मांडलं, मीरेने तुला ‘नटनागर गिरिधारी’ म्हणत साद घातली.

एक सांग, तू अनेक नाती निभावलीस पण जीव जडवलास तो फक्त राधेवर…! खरं ना? गोकूळ सोडल्यावर परत तू बासरी वाजवल्याचे उल्लेख कुठेच आढळत नाहीत.

गीतेत ‘यदा यदा हि धर्मस्य’ म्हणत तू परत येण्याचं वचन दिलं आहेस. पण आता युद्धासाठी नको रे येऊस, आम्ही माणसं म्हणजे एक एक बेट झालोय, यावर नात्यांचे पूल बांधायला ये!

आणि हो, येताना रुक्मिणीला नाही आणलंस तरी चालेल पण राधिकेला सोबत घेऊन ये, म्हणजे तुझी बासरी ऐकायला मिळेल.

कृष्णा, पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये!

—–दुर्गा भागवत.

संग्राहक : सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दुर्दम्य ! ☆ श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? विविधा ?

☆ दुर्दम्य ! ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

हो!! ब्यायशी वर्षं पूर्ण झाली अलिकडेच! दोन-चार दिवसांपूर्वीच. मुलांनी अगदी झोकात वाढदिवस साजरा केला! या वयापर्यंत पौर्णिमेचा चंद्र हजार वेळा येऊन गेलेला असतो आयुष्यात, असं म्हणतात. मी काही एवढं गणित मांडून बसत नाही. खूप नातेवाईक, मित्र सुद्धा आले होते शुभेच्छा द्यायला. खरंच कौतुक वाटतं सगळ्यांचं.

खरं म्हंजे आता डोळे दमलेत.  नजर अर्धीमुर्धी शिल्लक आहे. भुरकट, मळकट दिसतं सगळं. डोळ्यांना पाणी येत रहातं सारखं सारखं. पण अंदाजपंचे माणूस ओळखतो!

आं? काय? काय म्हटलंत? काऽऽऽन होय!! आता काय सांगणार कानांचं?? एव्हांना  तुम्हालाही कळलंच असेल. आता काप गेले आणि भोकं ऱ्हायली! तुम्ही बंड्या म्हणायचं आणि आम्ही खंड्या ऐकायचं!! इतकंच! हा हा हा!

दांत कधीच गळून पडलेत. बोळकं झालाय् तोंडाचं. पण हिरड्या इतक्या टणक, की काहीही चावून खातो! अगदी  पोळी-भाकरी सुद्धा. दाणे खावेसे वाटले, तर कुटून खातो. पण कुटाला दाण्याची चव नाही. कोवळ्या बारिक चिंचा सुद्धा खातो. दांत नसल्यामुळे ते आंबायचा तर प्रश्नच नाही. काय ते? कवळ्या नां? केल्यात ना. पण मला त्या कवळ्यांचं तंत्र कधी जमलंच नाही. पुढे देखिल जमेल असं वाटतं नाही. बोलतांना तोंडाच्या बाहेर पटकन उडी मारेल की काय, अशी भीती वाटते! आणखी म्हणजे कवळीच्या आतमधे कण अडकतात अन्नाचे आणि हिरड्यांना टोचतात!! मग जेवतांना कवळी तोंडाबाहेर काढायची,  मिचमिच्या डोळ्यांनी बघत  फडक्याला पुसायची आणि पुन्हा तोंडांत कोंबायची – म्हणजे इतरांना घाण वाटते!! आणि आपल्याला स्वतःला सुद्धा. घाण पण आणि लाज पण! असो.

कवळी म्हटल्यावर एक गंमतीची मजा आठवली. आम्ही तिसरी-चौथीत असतांना आम्हाला वाठारे या नांवाचे एक वयस्कर पण हिंस्त्र मास्तर शिकवायला होते. यम परवडला! एकदा ते बोटीने मुंबईला चालले होते. त्यांना बोट लागली. बोटीच्या काठावरून समुद्रात उलटी  करतांना त्यांची कवळी सुद्धा समुद्रात पडली! फजितीच की! नंतर मास्तरांच्या तोंडाच्या चिपळ्या झाल्या. आम्हाला खूप मजा वाटायची. पण हसायची भीती! आता आज तो सण साजरा करतो!

हा हा हा!!

हात-पाय ना? ते तर कायमचेच संपावर गेलेत! भारी दुखतात!! कोणाला सांगणार तेल लावून चोळायला? हल्ली लोकांना नसतो वेळ! मग आपलं आपणच लावायचं! पायांना जरा बरं वाटतं आणि हातांना चांगला व्यायाम होतो! बोटं दुखतात बऱ्याच वेळा हातांची. पण आपल्या हाताचा पंजा कॉटवर पालथा टाकून त्याच्यावर आपलंच बूड टेकून पाच-दहा मिनिटं बसलं ना की बरं वाटतं, असा मला शोध लागलाय्!

स्मरणशक्ती तशी ठीक आहे. जुनं जुनं अजून सगळं आठवतं. पण नवीन विसरायला होतं. समोरच्याचा चेहरा काहीसा लक्षात असतो, पण त्याचं नांव जाम आठवत नाही! एखादं पुस्तक आणायला कपाटाच्या खोलीत जातो, पण खोलीत गेल्यावर आपण इथे कशाला आलो होतो, हे जंग जंग पछाडूनही डोक्यात येत नाही! अशा वेळी पूर्वी मी स्वतःवरच चिडायचो. पण आता माझं मलाच हसायला येतं!

पण हे तर आता असंच चालायचं. यंत्राचे भाग झिजायचेच. निकामी व्हायचेच. असो. पण काही वेळा माझं मलाच आश्चर्य वाटतं. नीट, निरोगी जगायला आवश्यक असलेल्या गोष्टी नसून सुद्धा, मी ब्यायशीची वेस ओलांडली. यानं मी तर अचंबितच होतो!

एक गोष्ट मात्र खरी. आज मितीपर्यंत आजारपण असं कधी आलंच नाही. हा नशिबाचा भाग. कधी तरी सटीसामाशी सर्दी होते. पण मी बिंधास गोळी घेतो. गोळी घेतली तरी सर्दी जायला दोन-तीन दिवस जातातच, हे गृहितच धरायचं.

मन आणि बुद्धी अजून शाबूत असावी असं वाटतंय्! काय सांगावं? स्वतःला स्वतःचाच भास नसेल ना होत? कधी कधी मनांत विचार येतो –

शंभरी गाठेन कां?

काही माहीत नाही!

कोणालाच माहीत नसतं!!

शंभरी गाठण्याची दुर्दम्य इच्छा वगैरे काहीही नाही. आज्ञा आली की आनंदानं प्रस्थान ठेवायचं!

गाडी जोपर्यंत स्वतःहून चालत आहे तोपर्यंत चालावी.

ढकलायची वेळ येऊ नये. तशी वेळ येणार असली तर तिन स्वतःहूनच स्तब्ध व्हावं, अशी मात्र

दुर्दम्य इच्छा आहे!

ॐ शांती.

? ? ?

 

©  श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares