मराठी साहित्य – विविधा ☆ नवरात्र – सृजन सोहळा ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 विविधा 🌸

नवरात्र – सृजन सोहळा ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

श्रावण आणि भाद्रपद म्हणजे वर्षां ऋतुतून संक्रमण करीत आलेली सृजन सृष्ठी. पावसामुळं धरणी ओली चिंब भिजलेली. ग्रीष्म ऋतुतील उष्णतेमुळे भेगाळलेली माती किंवा धरती! पाण्याला आसूसलेली माती. मृगाच्या प्रतीक्षेत तृषित असलेले सृष्टी चराचर चिंब भिजून तर जातेच. जाताजाता कस्तुरीचा गंध पण देऊन जाते. तरीपण तिला पावसाची ओढ ही असतेच.

सुरुवातीला असणारा पावसाचा तसेच मातीचा खट्याळपणा दिसून येतोच. नवं परिणीतासारखी आस लागून बसलेली दिसते. पावसाचा पण तोरा काही कमी नसतो. वेळी अवेळी, ज्यास्त करून रात्री पहाटे, मनाला येईल तेव्हा सृष्टीचे लाड पुरवत असतो. गेली अनेक युगे ते सांख्य सिद्धांत मांडत आपल अद्वैत प्रेम जगाला दाखवून देत असतात. प्रकृती काय किंवा स्वभाव काय त्याला औषध नाही. पुरुष काय किंवा पाऊस काय मनमानी स्वभाव जातच नाही. वारा काय किंवा विज काय त्यांचा चेतना गुण सोडत नाहीत. पृथ्वी काय किंवा धरा काय ती बहू प्रसवा आहे. मेघाची पालखी ही आकाशात अविरत सजलेली असतेच. श्रावण भाद्रपद कसे सण वार व्रतवैकल्यात निघून जातात. कृषीवल आपले काम करत असतोच. जेवढं काही पाऊस आणि माती यांच्या कडून घेता येईल, तेवढं तो काढून घेत असतोच. त्यांच्या सृजन शिलतेचा फायदा हा सर्व चराचर घटकाना मिळत असतोच.

असं असताना पंचभौतिक घटकच बंड करत आहेत! अवकाळी पाऊस अवकाळी वादळ हे बदलत्या निसर्गाचे चित्र! ह्यात दोष कुणाचा ? निसर्गाचा की मानवाचा? अलबत मानवच ह्याला कारणीभूत आहे! शोध नन्तर प्रगती, प्रगतशील मानव ह्या पंच भौतिक सृष्टीवर घाला घालतो आहे असं नाही काय वाटत? कमी वेळेत भरपूर अन्नधान्य पिकवण्यासाठी बऱ्याच रसायनाचा मारा करतो.

अशीच असंख्य उदाहरणे देता येतील. निसर्गाचा समतोल ढळत आहे. वर म्हणायचे कली युग आहे ! ह्याचाच परिणाम समाज घटकात दिसते. असो.

घटस्थापना 

अश्विन प्रतिपदा ते दसरा असे दहा दिवस नवरात्री उत्सव साजरा केला जातो. ह्याच्या मागे बऱ्याच दंतकथा असल्या तरी, मुख्य सण हा स्त्री शक्तीचा जागर म्हणजेच सृष्टीच्या किमयेला आभार मानण्याचा उत्सव. परतीचा पावसाळा आणि त्यात कडक उन्ह आणि शरद ऋतुचे आगमन. सृष्टी विविध अंगाने भारलेली सौंदर्याने फुललेली. नटलेली. कडक उन्ह म्हणजेच ऑक्टोबर हिट. ती नदी ओढा तलाव जलसाठ्यातीला

जीवाणु व विषाणू ह्यांचा नाश करते, पाणी स्वच्छ करण्यासाठी मदत होते. रात्रीच्या शरद चांदण्यात ती ओझोनयुक्त होते. ह्याच वेळी आगस्ती ताऱ्याचा उदय होऊन पाणी निरजुंतुक होतं असते. वर्षांऋतू आणि शरदऋतुचा संधिकाल. सर्व नद्या ओढे विहीर तलाव पाण्याने गच्च भरलेले. म्हणेज दूर दृष्टीने परत वर्षां ऋतू येईपर्यंत तहान तृष्णा ह्याची भूक मिटलेली. कृषिवलांना आनंदी करणारी बाब. पुरेसा पाण्याचा साठा. ह्या किमयेच्या ऋणातून मुक्त करणारा हा उत्सव. सृष्टी आणि स्त्री ह्यांच्या गुणधर्मात निसर्गाच्या साधर्म्यातुन हा सण साजरा केला जातो 

घट हेच शरीर. त्यातील पाणी हाच आत्मा. ह्या घटाची नवरात्रीसाठी स्थापना. घट हा मातीतून साकारलेला. घटाखालची माती ही सृष्टीचे द्योतक. त्रिगुणात्मक. काळ्या मातीत बीज पेरणे हे बहू प्रसवा असल्याचे द्योतक.

नवं रंध्राच्या नवं रात्री! वरुन फुलांच्या माळा. शक्तीची उपासना. स्त्री शक्ती असो वा सृष्टीची निसर्गाची शक्ती. धरती आहे म्हणून आकाश आहे, आकाश आहे म्हणून पाऊस आहे. सोबतीला वारा अन अग्नी पण. अश्या पंचभौतिक निसर्ग किमयेला, स्त्री शक्तीच्या कौतुकाचा सोहळा म्हणजेच नवरात्र आणि दसरा. ह्या मागची कारणमिमांसा गहन आहे.

परंपरागत चालत आलेला सण, उत्सव ह्याचं हल्ली विद्रुप स्वरूप बघायला मिळणे, ह्यासारखे दुर्दैव नाही. हिडीस अन विकृत प्रदर्शन त्याच बाजरीकरण! स्त्रीला तिचा सन्मान पूर्वीसारखा परत मिळेल काय.

वासना अंध नाराधम ह्या असल्या गोष्टीचा फायदा घेत आहेत. गरबा नृत्य हल्ली फॅशन शो झाला आहे. किंवा दुर्गामातेची मंडळ विकृत स्वरूप दाखवत आहेत. रोजच्या जीवन प्रवासात स्त्री सुरक्षित आहे काय ? तुम्ही सुरक्षा देत नसाल तर, मग हे असली नाटके कश्याला ??

नवरात्री आणि रंग ह्यांचा काहीतरी सम्बन्ध असतो, असा जावईशोध पण हल्ली अलीकडेच लावला गेला. रंग! कापडं! आणि व्यापार! ह्या बाबत नं बोललेलं बरं! हा जिव्हाळ्याचा विषय ! तुम्ही नटा, सजा तो तुमचाच अधिकार आहे. तुमचे लाड, कौतुक पुरवून घ्यायला दुमत नाही. पण नवं रंगाचं गणित काही कळले नाही, आणि पचनी पडत नाही.

समाजात सर्व स्तरात स्त्री शक्तीने आज आघाडी घेतली आहे. त्यांचं असण समाजाला पूरक आणि प्रेरक आहे त्यात वाद नाही. बऱ्याच स्त्रियांचे काम उल्लेखनीय आहेत. अश्या स्त्रियांचा गौरव नक्कीच व्हायला पाहिजे, तो आम्हाला प्रेरक आहेच. काही गरजू गरीब स्त्रियांना लागेल ती मदत करणे हे पण समाजाच कर्तव्य आहे. अश्या उत्सवप्रसंगी त्यांना पुढे आणणं ही काळाची गरज आहे. तरच ह्या सणाचे औचित्य साधले जाईल. आणि स्त्री शक्तीचा मान राखला जाईल.

अथर्वशीर्षात सुद्धा ह्याचा उल्लेख आहे!!

ll प्रकृतये पुरुषात परं ll

एवं ध्यायती यो नित्यम स योगी योगीनां वरा ||

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “विस्मरणात चाललेला ठेवा – हादगा” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलु साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

🌸 विविधा 🌸 

☆ “विस्मरणात चाललेला ठेवा – हादगा” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलु साबणे जोशी ☆

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीला पितृपक्षांमध्ये कुठलेही सणवार असत नाहीत, अशा वेळेला ठिकठिकाणीच्या मुलींना उत्साह भरतो तो हादग्याचा.

कॅलेंडरमध्ये सूर्याचा हस्तनक्षत्र प्रवेश दिला असेल, त्याच दिवशी हादगा सुरू. अनेक नारीकर्तृक व्रताप्रमाणे याचेसुद्धा इतके पाठभेद आहेत की, मुळात व्रतराज ग्रंथात ‘हस्ती गौरी व्रत’ या नावाने दिलेल्या व्रताचे मूळ विधान बाजूला पडून वेगवेगळ्या रीती प्रचलित झाल्या आहेत. त्यातूनच विदर्भात ‘भुलाबाई’, मध्य महाराष्ट्रात ‘भोंडला’, कर्नाटकात ‘गजगौरी’ आणि पश्चिम महाराष्ट्रात ‘हादगा’ या नावाने हा खेळ होतो.

याच्यामध्ये मूळ ग्रंथात दिलेले विधान बघितलं तर ते असं आहे – कोणे एके काळी गौरी स्वप्नामध्ये शिवमूर्ति दग्ध झालेली पाहते आणि साहजिकच शंकरांना त्याचा परिहार किंवा कारण विचारताच शंकर सांगतात, ‘मध्यान्ह काळी घेतलेल्या निद्रेमुळे तुला असे विचित्र स्वप्न पडले. तेव्हा आता सूर्य हस्तनक्षत्रात असताना तेरा दिवस तू ऐरावतावर आपल्या दोघांसह गणेशाची प्रतिमा स्थापन कर आणि त्याची तेरा दिवस पूजा करून तेरा वर्षांनी त्या व्रताचे उद्यापन कर. ‘ पुढे भगवान श्रीकृष्णांनी कुंतीच्या इच्छेवरून तिला हे व्रत आणि कथा सांगितली. नेमकं त्याच वेळेला गांधारीने देखील हे व्रत ऐकले होते. मूळ कथेत पार्वती शंकरांना विचारते, ‘आपण मला सोन्याचा गणपती ईश्वर पार्वती – सोन्याच्या हत्तीवर बसवायला सांगितले आहे, पण जर समजा सुवर्णाची मूर्ति करणे शक्य नसेल, तर काय करावे अशा वेळेला?’ शंकर तिला म्हणतात, ‘सोन्याची शक्य नसेल, तर मातीची कर. ‘ या पर्यायाप्रमाणे गांधारी कौरवांना सांगून गंगाकिनाऱ्याची माती आणायला सांगते. हे बघून कुंतीला दुःख होते. गांधारीचे इतके पुत्र तिच्या व्रताचा मनोरथ सहज पूर्ण करतील हा विचार तिच्या मनात येताच अर्जुनाने आईच्या मनातले शल्य ओळखले. तो स्वतः गंगाकिनारी गेला आणि उमा महेश्वराचे तप करून शंकरांनाच विनंती केली की, ‘आपण ऐरावतावर बसून येऊन माझ्या आईची व्रतपूजा स्वीकार करावी. ‘ व्रताच्या प्रभावाने कुंतीच्या म्हणण्याप्रमाणे तिच्या पुत्रांना जय, यश, लाभ, सगळ्याची प्राप्ती झाली. असं हे व्रत तेरा वर्षं, तेरा तेरा दिवसांसाठी करून चौदाव्या वर्षी याचे उद्यापन करावे, असे विधान व्रतराज ग्रंथात आहेत.

विदर्भातली भुलाबाई, मध्य महाराष्ट्रातला भोंडला याविषयी मला अधिक सविस्तर माहिती नाही. पण हादगा म्हटलं की शाळेतल्या आठवणी जाग्या होतात. काल या लेखासाठी हादग्याचे चित्र शोधायला एका ठिकाणी गेलो. एरवी सगळं काही मिळणारे त्या दुकानात हादग्याचे चित्र मागितल्यावर त्या दुकानाच्या वृद्ध मालकीणीनं सांगितलं, ‘हल्ली आम्ही हादग्याचे चित्र ठेवत नाही. कारण किमान २५ कागद घ्यावे लागतात आणि तेवढे खपत नाहीत. म्हणून आम्ही हादग्याचे चित्र ठेवत नाही. ‘ हे ऐकल्यावर आणखीनच वाईट वाटलं, कारण साधारणपणे शाळेत असताना हादगा सुरू झाला की, प्रत्येक वर्गात एकेक चित्र तगडाला चिकटवून अडकवले जायचे, घरीसुद्धा बहीण, तिच्या मैत्रिणी आपापल्या घरी हादगा बसवायच्या. १६ दिवस कोणी खिरापत आणायची, कुणी माळ आणायची याचे क्रम ठरायचे. १६ माळा, सोळा प्रकारच्या असाव्यात, याकडे मुलींचं जातीने लक्ष असायचं. भिजवलेल्या गव्हाची माळ, फुलाची माळ, चिरमुऱ्याची माळ, रामाच्या पावलांची म्हणजे पारिजाताच्या बियांची, सोळा फळांची, १६ प्रकारच्या फुलांची अशा अनेक माळा हादग्याला चढवल्या जायच्या. रोज साधारणपणे तिसऱ्या प्रहरी म्हणजे जेवणाच्या सुट्टीनंतर दोन तास उलटून गेले की साधारणपणे चार वाजण्याच्या सुमाराला वर्गात फक्त मुलं शिल्लक राहायची. बाकी सगळ्या मुली एका पाटीवर हत्तीचे चित्र काढून तो हत्ती मध्ये ठेवायच्या. प्रत्येकीने आणलेली खिरापत तिथे ठेवलेली असायची. आमच्या शाळेत मुलांना देखील खिरापत आणायला परवानगी होती. खिरापतीचे डबे, फुलांनी सजवलेल्या हत्तीचे चित्र मध्ये ठेवलं की, हादग्याची गाणी सुरु व्हायची. पहिल्या दिवशी एक या क्रमाने गाणी वाढत जाऊन सोळाव्या दिवशी सोळा अशी गाणी असायची.

ही गाणी सुद्धा मराठीचा एक ठेवाच म्हणावी लागतील. ऐलमा पैलमा हे पारंपारिक पहिलं गाणं. गणपतीला ‘माझा खेळ मांडू दे’ म्हणून विनंती झाली की, तिथून पुढे गाण्यांच्या प्रकाराला मर्यादा नसायची. मग पारंपारिक सासुरवासाची निंदा, माहेरचं कौतुक, देवांचे वैभव असं वर्णन करणारी अनेक गाणी गायली जायची. ‘त्यातलं उरलं एवढंसंसं पीठ’ असं म्हणत पाककृतीची गाणी असायची. कधी ‘अक्कण माती चिक्कण माती’ म्हणत दळलेल्या रव्याच्या करंज्या – पालखीतनं माहेरी धाडल्या जायच्या, तर कधी ‘कोणा वेड्याच्या बायकोला वेड्याने कसं जिवंत जाळलं’ याची हसता हसता डोळ्यात पाणी आणणारी कथा गायली जायची. आडलिंबू ताडलिंबू म्हणताना फेर धरणाऱ्या प्रत्येकीच्या भावाचं नाव घेतलं जायचं. तर ‘आज कोण वार बाई’ म्हणून वाराच्या सगळ्या देवांना नमस्कार केला जायचा. वेळ कमी असेल तर ‘आड बाई आडोणी, आडाचं पाणी काढोणी’, याच्यापुढे ‘आडात होती देवळी, देवळीत होता… ‘ नंतर एक एक शब्द जुळवून ‘आमचा हादगा… ‘ असं गाणं संपवलं जायचं. त्याला एक गाणं मोजलं जायचं. उदाहरणार्थ, ‘आडात होती देवळी, देवळीत होता शिंपला, आमचा हादगा संपला’, हे शेवटचं गाणं. मग त्यात अगदी साबण-बामण, खराटा-मराठा अशी यमकं जुळवून सुद्धा कडवी जोडली जायची. हे म्हणताना कोणाला वाईट वाटणं, कोणी दुखावलं जाणं, वगैरे प्रकार काही नाहीत. पण ‘शिंपला’ म्हटलं मात्र की, आनंद व्हायचा, कारण आता पुढचा प्रकार असायचा तो खिरापत ओळखण्याचा. मग एकेका पदार्थांची नावे घेणे आणि डब्यातून वास येतो का, हाताला गरम लागतं का, वगैरे खिरापत ओळखण्याचा प्रकार व्हायचा. हे सगळं करताना आपली खिरापत ओळखली जाऊ नये यासाठी खिरापत आणणाऱ्याचा फार अट्टाहास असायचा. विशेष म्हणजे त्या काळातल्या आयांना अशी न ओळखणारी खिरापत करून देणे हे सुद्धा एक प्रेस्टीजच वाटायचं. कारण तो त्या आईच्या पाककलेच्या सन्मानाचा विषय असायचा. सोळा दिवस झाले की, सोळाव्या दिवशी हादग्याची बोळवण असायची. भिंतीवर लावलेलं हादग्याचे चित्र (हे सुद्धा एक गमतीचाच भाग आहे – कोल्हापुरात दगडू बाळा भोसलेंच्या दुकानात ही चित्रं मिळतात. त्या चित्रांमध्ये दोन बाजूला दोन हत्ती, त्याच्यावर बसलेले माहुत, माहुताच्या मागे अंबारी, अंबारीत राजा राणी म्हणजे गौरीशंकर, तेही मराठी शाही थाटात, त्यांच्या मागे चवऱ्या मोर्चेल घेतलेले दोन सेवक, अंबारीला धरून उडणाऱ्या देवकन्या म्हणजे पऱ्या, दोन्ही हत्तींच्या मध्ये फुगडी घालणाऱ्या दोन स्त्रिया, त्यांच्या हातावर कुंडीत उगवलेलं उंच फुलाचे झाड आणि त्या झाडावर बसलेली दोन माकडं, विशेष म्हणजे दोन्ही हत्तींच्या पायामधे बसलेले सिंह. मला वाटते गांधारीच्या मातीच्या हत्तीचे आणि कुंतीच्या प्रत्यक्ष शिवपार्वतीचे ते दोघेही प्रतीक असावेत, कारण त्या दोन्ही हत्तीत काहीही फरक असत नाही, असं ते चित्र!) उचलून माळा, फुलांसह जवळच्या ओढ्याला पाण्याला विसर्जित करण्यासाठी नेले जायचे. तिथे गेलं की पुन्हा फेर धरला जायचा. आज सगळ्यांनीच खिरापत आणायची असे. ती ओळखायची नाही, तर गोपाळकाल्यासारखी प्रत्येकाच्यातली थोडी थोडी वाटून घ्यायची असं झालं की, हादगा विसर्जीत करायचा. आमच्या इथल्या एक काकू पोरींना आठवण करायच्या, “हादगा लवकर बोळवा गं. त्याला दिवाळी दाखवू नये. नाही तर पाऊस दिवाळीपर्यंत थांबतो. “

हस्त नक्षत्रावर पडणारा पाऊस हा हत्तीच्या सोंडेतून पडणाऱ्या पाण्यासारखा कमी वेळात धुंवाधार. हा पाऊस पाणी पाणी करून टाकतो. म्हणूनच हा हत्ती बसला की बसतो अशी समजूत आहे. तो जर नवरात्राच्या पहिल्या माळेला पडला तर वातीत सापडला, किंवा माळेत सापडला, असं म्हटलं जातं. म्हणजे तो नऊही दिवस पडणार अशी अटकळ बांधली जाते.

असा साध्याभोळ्या पोरींचा आणि न ओळखणारी खिरापत हे एक चॅलेंज मानणाऱ्या आयांचा सण म्हणजे ‘हादगा’. कालौघात पोरीबाळी शाळा, क्लास, एक्स्ट्रॉ करिक्युलम यामध्ये बिझी झाल्या आणि हादग्याचं प्रस्थ शाळेतूनही हद्दपार झाले. आता कुठे तरी एखादी संस्था, एक कल्चरल ॲक्टिव्हिटी म्हणून एखाद् दिवसाचा हादगा घेते आणि तिथे पोळीबाळी नटून थटून जाऊन रेकॉर्डेड गाणी म्हणतात. ‘कालाय तस्मै नमः’, दुसरे काय?

॥श्री मातृचरणारविंदस्य दास प्रसन्नसशक्तिकः॥

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मिरजेतला उदास आपलेपणा… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

🔅 विविधा 🔅

☆ मिरजेतला उदास आपलेपणा… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर 

वडिलांच्या बदलीचा हुकूमनामा आमची इवलीशी आयुष्ये ढवळून टाकीत असे. पुण्यातल्या नूतन मराठी विद्यालयाच्या लहान शाळेत चौथीच्या वर्गातून मिरजसारख्या ठिकाणी जायचा आदेश जरा जास्तच जाचक वाटला. छानसा गणवेश, शाळेत पोहोचवायला-आणायला घरची माणसे, डबा, दप्तर, मातकामाचा वर्ग, सवंगडी या सौख्यातून उठून जाऊन मिरजेच्या शाळेत गेले, तेव्हा जीव घुसमटला.

मिरजमधला दिवाण जोशींचा भला मोठा वाडा अंधारात बुडून जाई. माडीवरच्या बाल्कनीत उभे राहिले, की शहरही अंधारात बुडल्यासारखे वाटत असे. पुण्याची आठवण येऊन जीव कासावीस होई. तिथून मिरजेचा मिरासाहेबांचा दर्गा दिसे. रात्री घुमटावरचा हिरवा दिवा पाहून अंधार अधिकच गडद होई. अशावेळी माझा सांगाती रेडिओ असे आणि रेडिओ सिलोन माझ्या सांत्वनासाठी चित्रपटसंगीताची भरगच्च शिदोरी घेऊन येत असे. रेडिओचे निवेदक मला एकेक गाण्याची अचूक माहिती पुरवीत असत. त्या वेळी जुन्या गाण्यांची अन आगामी चित्रपटांतल्या गाण्यांची बरसात होत असे.

त्या वेळी ‘फागुन’ चित्रपटातली गाणी रेडिओवर प्रचंड वाजत असत. माझ्या बालपणाने एक बोट शंकर-जयकिशनच्या हाती दिले होते – दुसरे ओ. पी. नय्यरने पकडले. ‘पिया पिया ना लागे मोरा जिया’, ‘इक परदेसी मेरा दिल ले गया’, ‘छुन-छुन घुॅंगरू बोले’, अशी गाणी कितीदा तरी ऐकू येत. अशाच एका उदास संध्याकाळी ‘फागुन’ मधले गाणे लागले- ‘मैं सोया अखियाँ मींचे’- ‘तेरी जुल्फों के नीचे’ आशा-रफीच्या युगलगीतातल्या संथ लयीने माझे इवलेसे हृदय हलले. ‘ये कौन हँसी शरमाया, तारों को पसीना आया… ‘ त्यातल्या नर्म शृंगार, प्रणय, शब्दांतून झिरपणारी प्रेमभावना, याबद्दल माझे बालमन पूर्णपणे अनभिज्ञ होते. जुल्फें, बाहें… याबद्दल अगदी बेखबर ; पण पुणे सोडून आलेले नव्या दुनियेत एकाकी विहरणारे माझे मन त्या गाण्यातल्या शब्दसुरांकडे झेपावले. मग मी रोज विशिष्ट वेळी त्या गाण्याची वाट पाहू लागले.

अशा वेळी आणखी एका गाण्याने मला खुणावले. ‘चंपाकली’ चित्रपटातले लताचे ‘छुप गया कोई रे, दूरसे पुकारके, दर्द अनोखे हाय, दे गया प्यार के… ‘ माझ्या मनात त्या ‘दर्द’ ने हलकेच प्रवेश केला असावा आणि शब्दार्थ- भावार्थ ओलांडून ते गीत मला आणखी उदास करीत राहिले अन कधी-कधी थोपटत राहिले.

हळूहळू मिरजदेखील आपलेसे वाटू लागले. मित्र-मैत्रिणी, बाई, मास्तर, यांचे वर्तुळ जमू लागले. रेडिओ सिलोननी सुवर्णकालाच्या संगीताची टांकसाळ माझ्यासाठी खुली केली होती. अमर, देवल चित्रपटगृहांत पोस्टर्स झळकू लागताच त्यातल्या एकेका गाण्याचे तपशील माझ्या जिभेवर हजर असत आणि गाण्यांनी माझे अवघे जग भारून जाई.

एके दिवशी सामानाची बांधाबांध पुन्हा सुरु झाली. अंबाबाईचे देऊळ, मिरासाहेबांच्या दर्ग्याचा उरूस, किल्ल्यातले आत्याचे भले मोठे घर, तिच्या कानडी भाषक घरातले खमंग पुरणाचे कडबू, बसप्पा, मलप्पा चौगुलेंचे पेढे… अशा मिरजेकडे पाठ फिरवून पुण्यात आलो. पुढच्या घटनांनी आयुष्य भरून गेले. चित्रपटगीतांनी भरभरून माप पदरात टाकले. त्या गाण्यातून जीवनाचा वेध घेण्याचा छंद जडला. सळसळत्या वृक्षांतून जीवनरस मिळवावा, तसा गाण्यांचा अक्षय्य ठेवा लाभला. मिरजेत ऐकलेल्या गाण्यांचे अर्थ उमगत राहिले.

‘आज है सुनी सुनी दिलकी ये गलियां 

बन गयी कांटे मेरी खुशियो की कलियां 

हाय! याही तो मेरे दिन थे सिंगार के… ‘

… हे पुन्हापुन्हा ऐकताना मनात असोशी भरून राहायची.

‘मुस्कुराओ के जी नहीं लगता’ सारख्या गाण्यासाठी मी माझी सारी व्यवधाने दूर ठेवायची. चित्रपटाचे प्रवाह बदलले अन आपल्या जीवनाचेदेखील. कृष्णधवल चित्रपट गेले; रंगीत आले. अँग्री यंग मॅनच्या युगाचे उदयास्त झाले. तरीदेखील सुवर्णयुगाच्या चित्रपटगीतांनी खिशातली नाणी खुळखुळत राहिली. आपल्या श्रीमंतीला ओहोटी लागलीच नाही, असे वाटत राहिले. त्या श्रीमंतीला आणखी एक मोरपीस लागले.

ज्यांची नावे गाण्यापाठोपाठ निवेदक ऐकवीत राहायचा, त्यांना प्रत्यक्ष भेटायचे योग् आले. पुढे तो माझ्या कामाचा एक भाग झाला. भेटी, मुलाखती, लेखन आणि पुन्हा गाण्याच्या आनंदाची मैफल होत राहिली. बाहेरच्या अपमानाचे, उपेक्षांचे बाण परतवून लावणारा अक्षय्य भाता माझ्या जवळ होता ना ! 

एके दिवशी मुंबईतल्या संगीतप्रेमी स्नेह्याने निरोप पाठवला.. त्या संध्याकाळी आठवणी जागवायला जमलेल्यांमध्ये वयोवृद्ध कवी प्रदीप होते. संगीतकार अनिल विश्वास मीनाजींबरोबर हजर होते. मोती सागर, सितारादेवी, शायर कमर जलालाबादी होते. गप्पांची मैफल रंगात आलेली होती. शेरोशायरी, विनोद यांना बहर आला होता. ‘रोटी’ मधला सितारादेवींचा हृदयस्पर्शी रोल, ‘दूर हटो ऐ दुनियावलों’ ची छपन्न कडवी लिहून आणणारे कवी प्रदीप, अनिलदांनी ऐकवलेली फैज अहमद फैज यांची गझल.. मैफल रंगात आली होती. चहापानाच्या वेळी मी कमरसाहेबांना ‘जलती निशानी’ मधल्या लताच्या ‘रूठ के तुम तो चल दिये’ बद्दल छेडले… हे गाणे आठवते का विचारले. त्यांनी अनिलदांकडे पाहिले. म्हणाले, “कसे विसरणार? चित्रपट पहिल्याच शोनंतर कोसळला होता !” … त्या दोघांना हसू आवरेना. अनिलदांनी त्याला संगीत दिलेले होते.

हरवून गेलेल्या चित्रपटांतली अविस्मरणीय गाणी… सोन्यासारखी गाणी… तीच तर माझ्याजवळ आहेत.

‘हे माझे कुँवार डोळे-तुझ्याशी नजर मिळवताना खाली झुकले आहेत. हरले आहेत. तू माझा जन्मोजन्मीचा साथीदार आहेस ना… मग, चल, माझ्या भांगात चांदण्या भर… ‘ … अशा अर्थाची गाण्यातली ओळ चित्रपटसंगीताच्या फार मोठ्या ‘बिझिनेस’ मधून मी हलकेच गाठीशी बांधते. फार लहानपणीचा दर्ग्याच्या घुमटावरचा दिवा आठवतो. त्याला लपेटलेला अंधार आठवतो; पण त्याहीवेळी आपण उगाच उदास का झालो होतो, ते कळत नाही…

आजदेखील गाणे ऐकताना डोळे का भरतात… ? छे ! या वयात मन आवरायला शिकले पाहिजे…

©  सुश्री सुलभा तेरणीकर

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अक्षर… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 विविधा 🌸

☆ अक्षर…  ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

विश्वातील अनादी काळापासून, अक्षरशः अक्षर निर्मिती ! न क्षरती इति 

अक्षर ! ज्याचा नाश कधीच होत नाही असे अक्षर ! अक्षर कुठून तयार झाली ? भाषा व लिपी कोणती जरी असली तरी , अक्षर ही प्रथम नाद निर्माण करतात ! नाद हा परत दोन प्रकारचा आहत आणि अनाहत !  आहत नाद 

मुखातून वा कोणत्याही आघातजन्य पदार्थापासून निर्मित असतो अनित्य असतो. अनाहत नाद हा स्वर्गीय नित्य असतो. मुखातील जिव्हा, टाळू, दंत ओष्ट, नासिक ह्यांच्या आघातामुळे नाद किंवा अक्षर तयार होत असते. 

अ उ म – म्हणजेच ओम  हा आकार, उकार, मकार ह्या तीन धातूंपासून तयार झाला आहे . 

अक्षर हे मानवाचे प्राण आहे ! बघा हं विचित्र वाटेल पण त्रिकालाबाधित सत्य आहे ! जन्मतः प्रसव झाल्यापासून को s हं ? किंवा को अहं ! ह्या अक्षरांना किती महत्व आहे हे तुम्ही जाणताच . बाळ रडले ह्याचा अर्थ त्याचा पहिला श्वास चालू झाला ! रडणे म्हणजेच श्वास घेणे आणि सोडणे , म्हणजेच त्याचा श्वासोच्छ्वास चालू झाला ! ह्यांचाच अर्थ त्याचे फुफ्फुसे व ह्रदय क्रिया चालू झाली !त्याला जीव प्राप्त झाला ! मंडळी  हाच तो अनाहत नाद ! इथे कुठलाच आघात न होता अक्षर तयार झाले ! ईश्वर निर्मित नाद ! अक्षरे देऊन गेला ! प्राण व्यानं उदान ह्या वायूची गती इथे प्राप्त झाली .  प्राण ह्रदयस्थित व्यानं फुफ्फुस स्थित , उदान कंठ स्थित !

आपण बोलताना वरील तिन्ही वायूंचे चलनवलन होत असतेच . अपान वायू मलमूत्र विसर्ग होत असताना कार्य करते . तर समान वायू 

अग्निवर्धन करून अन्न पचन करते. आघात होण्यासाठी वायू व आकाश ह्याची गरज आघात मुखात होतो व तोंडातील वा श्वास मार्गातील पोकळी किंवा अवकाश अक्षर , शब्द निर्मिती करत असते . माणूस सजीव असेपर्यंत अक्षर आवाज जन्मापासून मृत्यू पर्यंत अव्याहतपणे चालू असते ! आघात अक्षर शब्द हे जेव्हा थांबतील तेव्हा जीव नाहीसा होतो ! जीव जात  असताना पण घश्यात घुरघुर लागते व श्वास थांबतो – त्यालाच मृत्यू म्हणतात ! 

अनेक अक्षर मिळून शब्द तयार होतो , परा – पश्चन्ती मध्यमा – वैखरी ही त्याचे सूक्ष्म रूपे होत ! बेंबीच्या देठापासून ते कंठातून – मुखापासून बाहेर पडण्याच्या क्रियेला खरतर फुफ्फुसे व कंठ श्वासपटल मुख ही सर्व कार्यरत असतात ! त्यासाठी वरील तिन्ही वायूचे साक्षात प्राणाचे कार्य अव्याहतपणे चालू असते . शरीरांतर्गत ह्या सूक्ष्म क्रिया असतात . तो सजीव बोलत असतो आहत नादामुळे , मुखातील आघातामुळे ! ह्याच आघातामुळे नादमय संगीत पण तयार होत असते .

अक्षर ही सरस्वती कृत निर्मित ! तर चौदा विद्या चौसस्ट कला ह्या श्री गणेशाधीन श्री गणपती ही त्याची देवता . मग सरस्वती पूजन का ? सरस्वती ही प्रत्येक्ष्यात प्रतिभा ! उत्स्फूर्तता ! सृजनशील ! वाक् – बोलणे , ईश्वरी – अनाहत नाद निर्माण करणारी बीज मंत्र !

अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ आं 

यरळवष श स हं ळ क्ष ज्ञ 

क ख ग ग इत्यादी मुळाक्षरे 

काही भाषेत बाराखडी, तर काही भाषेत चौदाखडी

उदा. कानडी भाषा चौदाखडी ( ह्रस्व आणि दीर्घ ए ) असो. 

पाणिनीला मात्र वेगळीच बीजमंत्र मिळाले . शंकराच्या डमरूतुन त्याला चौदा शब्द समुच्चय मिळाला ! त्यावरच पाणिनीने लघुसिद्धांत कौमुदी हे व्याकरण शास्त्राचे नवीन प्रबंध निर्माण केला . जे आजही व्याकरण शास्त्राचे आधारभूत ग्रंथ म्हणून पाहिले जाते . चार चार अक्षरांचा चौदा समूह तयार करून त्यांनी , अक्षरपट मांडला . विस्तार भयास्तव येथे देत नाही ! तरीपण ह्या शास्त्राला नाद संरचना ( phoneticks ) म्हणून जगात मान्यता आहे ! 

कर्ण बधिर शास्त्रात उपयोग केला गेला ! महत्वाचे म्हणजे मला अस प्रश्न पडतो की ? 

सुदृढ माणूस ऐकू शकतो , बोलू शकतो . मूक बधिरांचं काय ? ? अक्षर समूह म्हणजे शब्द , शब्द समूह म्हणजे वाक्य . नाम क्रियापद कर्म , इत्यादी . 

ही मुळाक्षरे, तसेच संगीत शास्त्रातील , “सा रे ग म प ध नी सा”  सप्तसूर कोमल स्वर 

“मंद्र मध्य तार सप्तक” ह्यांचा  कंठातून होणारा आघात – नादमय ध्वनी इथे मुळाक्षरे सप्तस्वरच राज्य करतात !

अस असलेतरी मुखातून आलेला ध्वनी कर्ण पटलावरच कार्य करतात, किंबहुना कर्ण अबाधित असेलतरच ह्याचे ज्ञान होणार . 

मुळाक्षरे जशी आहेत तशीच बिजाक्षरे पण वेदानी प्रमाणभूत मानली आहेत. हीच बिजाक्षरे देवांच्या प्राण प्रतिष्ठासाठी ग्राह्य मानली जातात. 

आपण वार्षिक गणपतीचा उत्सव दहा दिवस आनंदाने साजरा करतो . दहा दिवस  आपण मनोभावे पूजा करतोच बाजारातून   आणलेला गणपती, घरी पूजेसाठी ज्यावेळी मांडतो त्यावेळी, बिजाक्षरानी त्यात प्राण व्यान उदान अक्षरांनी प्रतिष्ठा केली जाते. ती अक्षरे खालीलप्रमाणे.

ओं आं ह्रिम क्रोम् । 

अं यं रं लं वं शम वं सं हं लं इत्यादी — सर्व अनुनासिक अक्षर 

जन्मतः बाळ रडत ते पण अनुनासिक अक्षर !

को ss हं किंवा टँहै टँह्या ही अशी अनादी अनंत प्रक्रिया सृष्टीत अव्याहत चालू आहेच. बऱ्याच वनस्पतीमध्ये पण ही क्रिया चालू असतेच उदा. केळीचा कोका ज्यावेळी बाहेर पडतो त्यावेळी आवाज येतो. तो अक्षरशः अक्षरांनी. तस बरेच काही अक्षराबद्दल सांगता येईल. ह्या जगात तुम्ही आम्ही असू वा नसू पण अक्षरे ही अबाधित असतील एवढं मात्र खरे !

तेच प्रांजळ सत्य आहे . 

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मला भावलेला श्रीकृष्ण” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? विविधा ?

☆ “मला भावलेला श्रीकृष्ण” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

 (‘shopizen.in‘ यांच्यातर्फे आयोजित केल्या गेलेल्या “ माझ्या मनातला श्रीकृष्ण “ या विषयावरच्या एका उपक्रमाअंतर्गत आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका व कवयित्री ज्योत्स्ना तानवडे यांच्या लेखाला “ सर्वोत्कृष्ट लेखन “ म्हणून गौरविण्यात आलेले आहे. याबद्दल आपल्या सर्वांतर्फे ज्योत्स्नाताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा. आज हा लेख सर्वाना वाचण्यासाठी उपलब्ध करत आहोत.

हे श्रीकृष्णा, नव्हे नव्हे युगपुरुष भगवान श्रीकृष्णा नमस्कार !

पण तुला बाळकृष्ण म्हणावे, माधव म्हणावे, मुकुंद म्हणावे, मुरलीधर म्हणावे, कन्हैया म्हणावे, वासुदेव म्हणावे का योगेश्वर म्हणावे ? नक्की काय म्हणावे असा मोठा प्रश्न पडतो. कारण तुझ्या प्रत्येक रूपाची मोहिनी वेगळी आणि लीलाही वेगळ्या. पण प्रत्येकच रूप तितकेच लोभस अन् हवेहवेसे.

हे युगंधरा,

परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम 

धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||

असे वचन तू दिले होतेस आणि ते पूर्ण करण्यासाठी द्वापरयुगात श्रीविष्णूंचा आठवा अवतार म्हणून वसुदेव देवकी यांचा पुत्र म्हणून अवतार घेतलास.

हे देवकीनंदना, तुझ्या बालरूपाने तर चराचरावर मोहिनी घातली. अवघ्या गोकुळाला तुझे वेड लागले. अगदी बालपणापासून तू अनेक खोड्या केल्या, पराक्रम केलेस. ते सर्व कृष्णलीला म्हणून प्रसिद्ध आहेत.

अगदी बालपणातच तू पूतना राक्षसीचा वध केलास. यशोदा मातेने उखळाला बांधून ठेवले असताना रांगत जाऊन दोन झाडे पाडून नलकुबेर आणि मणिग्रीव या दोन कुबेर पुत्रांना शापमुक्त केलेस. यशोदा मातेला आपल्या मुखामध्ये विश्वदर्शन घडवलेस. कालिया मर्दन करून कालिया नागाला यमुनेच्या डोहातून निघून जायला लावलेस. केवळ हाताच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून गोकुळवासियांचे मुसळधार पावसापासून रक्षण केलेस.

हे बाळकृष्णा, अशा अनेक घटनात तुझे देवत्व प्रकट होत गेले. पण प्रत्यक्षात मानव रुपातले तुझे मोहक हसरे रूप सर्वांना आकर्षित करणारे होते. कारण कृष्ण म्हणजेच आकर्षून घेणारा. डोळ्यात प्रेम, करुणा, वात्सल्य दाटलेले, चेहऱ्यावर आपुलकीचे लोभस भाव आणि तुझे ते खट्याळ लडीवाळ हसू प्रत्येकाला आपलेसे करून घेणारे म्हणूनच प्रत्येक जण तुझ्यावर जिवापाड प्रेम करणारा.

हे कन्हैया, तुझे तरुणपणातले मुरलीधर रूप सर्वांचेच अतिशय लाडके. तुझ्या बासरीचे सूर चराचराला धुंद करीत. त्या सुरांनी माणसेच नव्हे तर अवघे गोधन, पशू, पक्षी तुझ्या भोवती जमा होत असत.

हे योगेश्वरा, तू शूरवीर पराक्रमी योध्दा, न्यायनिपूण कुशल प्रशासक, दुर्बलांचा तारणहार, दुष्टांचा संहारक होतास. कौरव पांडवांचे युद्ध होऊ नये, संहार टळावा म्हणून तू शेवटपर्यंत प्रयत्नशील होतास. कौरवांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केलास. पण ही ‘कृष्णशिष्टाई’ अखेर विफल ठरली.

पुढे कुरुक्षेत्रावरील धर्मयुद्धात शस्त्र हाती न धरता एका उदात्त हितोपदेशकाची भूमिका उत्तम रीतीने पार पाडलीस. त्यामुळेच पांडव धर्मयुद्धात विजयी झाले. याचवेळी सर्व मानवजातीला मार्गदर्शक असा गीतोपदेश तू अर्जुनाला केलास. जीवनात प्रत्येक गोष्टीत ही गीतातत्वे आजही मार्गदर्शक ठरत आहेत. हे गीता तत्वज्ञान जीवनाची गाथा आहे.

हे वासुदेवा, तू मानव देहधारी अवतरलास. मानवाप्रमाणे जीवनातले सुखदुःखांचे चढ उतार सहन केलेस. सर्व भोग उपभोगलेस आणि भोगलेसही. दुःख, कष्ट, तिरस्कार, पीडा सहन केल्यास. आयुष्यातील सर्व नात्यांना योग्य न्याय देत सर्व नाती उत्तम निभावलीस. माता, पिता, सर्व वडिलधाऱ्यांना योग्य सन्मान, प्रेम दिलेस.

गुरूकुलात सर्व शिष्यांसमवेत त्यांच्यातला एक होऊन राहिलास. मित्र असावा तर असा म्हणत गरीब सुदामाशी आयुष्यभर मैत्री निभावली.

गोकुळवासी गोधन सांभाळायचे. पण कंसाच्या धाकाने सर्व दही, दूध, लोणी मथुरेच्या बाजारात जायचे. खरे तर त्यावर पहिला हक्क गोकुळातल्या बालगोपालांचा. त्यांच्यासाठी तू दहीहंडी फोडण्याला सुरवात केलीस. सर्वांमधली एकात्मता टिकवण्यासाठी गोपाळकाला करायला लागलास.

हे गोविंदा, तू कालियाला दुसऱ्या वनात पाठवून यमुनेचे जलशुद्धीकरण केलेस. गोधनाची अतिशय मायेने काळजी घेतलीस. गोवर्धन पूजेच्या निमित्ताने निसर्ग पूजनाचा पायंडा पाडलास. सगळ्यांना निसर्ग रक्षण, संवर्धन, प्राणी प्रेमाची महती शिकवलीस.

हे माधवा, द्रौपदीला बहीण मानून अखंड पाठीराखा झालास. नरकासुराच्या बंदीवासातून १६००० जणींना मुक्त केलेस आणि त्यांना सन्मानाचे जिणे प्राप्त व्हावे म्हणून त्यांना आपल्या पत्नीपदाचा दर्जा दिलास. स्त्रियांचा सदैव आदर केलास.

अगदी कंस, जरासंध, शिशुपाल यांना चुका सुधारण्याची संधी दिलीस. शंभर अपराध भरल्यानंतर वध केलास. अनन्यभावाने शरण आलेल्यांना अभय देत दुष्टांच्या दुष्कृत्यांना शिक्षा केलीस. सदैव नीतीचे, न्यायाचे अनुसरण केलेस.

हे मोहना, विश्व कल्याणासाठी दुष्ट शक्तींचे निर्दालन करून धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी विविध रूपात तू लीला केल्यास. या तुझ्या देवत्वाबरोबरच तुझ्यातलं मनुष्यत्व अतिशय मोहक आणि सर्वांना अगदी जवळचं वाटणारं आहे. सर्व नात्यांना जपणारं तुझं कुटुंबवत्सल रूप मला जास्ती आवडतं.

तुझ्या कृती उक्तीतून तू आपल्या वागण्याला अध्यात्मिक, सामाजिक, नैतिक अधिष्ठान कसे हवे हे दाखवून दिलेस. जीवनात आसक्ती आणि विरक्ती कशी असावी हे दाखवलेस. भक्ती कशी असावी, दुसऱ्याला नेहमी माफ करावे, परोपकार, संरक्षण करावे, नेहमी सत्याची बाजू घ्यावी, त्याचा लगेच परिणाम दिसला नाही तरी सत्याचाच शेवटी विजय होतो अशा अनेक गोष्टी तू कृतीतून दाखवत होतास.

हे दीनबंधो, राजसभेत दु:शासनाने तिच्या वस्त्राला हात लावताच द्रौपदीने तुझ्या असंख्य नावाने तुझा धावा केला. पण तू आला नाहीस. शेवटी तिने, ” हे दीनदयाळा, भक्तवत्सला, आत्मारामा मी तुला अनन्यभावाने शरण आले आहे. माझे रक्षण कर, ” अशी विनवणी करताच तू प्रकट झालास. कारण नुसती स्तुती नव्हे तर अंत:करणापासून मारलेली हाक तुझ्यापाशी पोहोचली. अशी समर्पण भक्ती तुला आवडते. तू आम्हाला निष्काम कर्मयोग, निरपेक्ष प्रेम, नि:स्वार्थ भक्ती शिकवलीस. म्हणूनच तुझी तुला करताना सत्यभामेच्या जडजवाहीराने नव्हे तर रूक्मिणीच्या एका तुळशीपत्राने पारडे खाली गेले. तिचा अनन्यभाव तुला प्रिय होता.

तू शिकवलेल्या या गोष्टी आचरणात आणून सुखाने जगणे शक्य आहे. पण आज कलियुगात माणूस पुन्हा उद्दाम, बेफाम बनू लागला आहे. आपलं माणूसपण विसरला आहे. मायबाप आणि लेकरांचे पवित्र नाते दुरावते आहे. कुटुंबांमधे मतभेदाच्या भिंती उभारल्या आहेत. स्त्री आज सगळीकडेच असुरक्षित झाली आहे. समाजातले दु:शासन राजरोस तिच्या वस्त्राला हात घालत आहेत. समाजातला एकोपा संपत चालला आहे.

हे पुरूषोत्तमा, आज तुझी प्रकर्षाने आवश्यकता आहे. तुझ्या कृपेने प्रत्येकाच्या मनातला निद्रिस्त कृष्ण जागा कर. प्रत्येक स्त्रीच्या मनातली दुर्गा जागृत होऊ दे. अन्याय, अत्याचार लयाला जाऊ देत. पुन्हा सर्वत्र सुधर्माचे राज्य येऊ दे.

हे मधुसुदना, पुन्हा एकदा साऱ्या विश्वाला आश्वस्त करणारे, सर्वांवर कृपेची पाखर घालणारे तुझ्या बासरीचे मधुर स्वर चराचरात घुमू दे. श्रीकृष्णाय नमः ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ – जोगवा – ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

?  विविधा ?

☆ – जोगवा – ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

आदिशक्ती, आदिमातेच्या उपासनेचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव !

पूर्वी कुटुंब मोठे होती.  रोजचा देवाला नैवेद्य, सप्तशती पाठ, आरती’, नऊ दिवस सवाष्ण, रितीप्रमाणे कुमारिका जेवायला असायची. देवापुढे  अखंड दिवा तेवत असायचा आरती पूजा पाठ यात सगळं घर रंगून जायचं. नऊ दिवस उपास कधी धान्य फराळ अष्टमीला विशेष असं महत्त्व असायचं आणि सगळ्या घरात वातावरण अगदी पवित्र मंगलमय असायचं. 

घरोघरी घटस्थापना असायची. त्याची दसऱ्याला सांगता होऊन ‘दसरा सण मोठा … नाही आनंदा तोटा’ असा दसरा साजरा व्हायचा. अजूनही आपण ही संस्कृती परंपरा जपतो. … देवीला म्हणतो ‘सांभाळून घे आई! चुकलं तर योग्य मार्ग दाखव.’  या आदिशक्तीला आपली संस्कृती स्त्रीरूपात पाहते. आपण तिला माता ..  आई ..  असं संबोधून पूजा करतो, अन् घरातली ‘स्त्री ‘..ती घरासाठी आपल्या मुलांसाठी सगळ्यांसाठीच देवीकडे काहीतरी मागणं मांडतेच….  आणि स्वतःसाठी अखंड सौभाग्य ! 

पण आज स्त्रीला एवढेच मागून चालणार नाही.  तिने देवीपुढे हात जोडावे ते तिचा आधार मागण्यासाठी .. प्रार्थना करण्यासाठी, सगळं काही सोसण्याचं बळ मिळवण्यासाठीच नव्हे, तर अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी, अत्याचाराला प्रतिकारशक्ती, लढा देण्याची शक्ती लाभावी यासाठी.  तसेच या आदिशक्तीची शक्ती मिळावी यासाठीही.! 

त्यामुळे ‘मी- माझ्या पुरतं’ या वर्तुळाचा परीघ वाढवून समाजासाठी, रंजल्या गांजलेल्या स्त्रियांसाठी, तिला काही भरीव वेगळं असं करता येईल. आणि प्रत्येक गोष्टीसाठी इथं तिथं जोगवा मागण्यापेक्षा प्रत्येक स्त्रीने स्वतः ‘स्त्री ‘ही स्वयंभू शक्तीच व्हावं, म्हणून “वाढ ग माय जोगवा$ ” म्हणत हात जोडून फक्त देवीपुढे ‘जोगवा’ मागावा.! इतर कुणाकडे नाही. आज त्याचीच गरज आहे. 

देवी माता नक्कीच हा जोगवा देईल.व खऱ्या अर्थानं हा देवीचा नवरात्रोत्सव व दसरा साजरा करता येईल. 

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग २८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग २८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

 (पूर्वसूत्र– माझी यापुढची उत्कर्षाची वाट वळणावळणाची असणाराय असं सर म्हणाले ते अनेक अर्थांनी खरं ठरणार होतं आणि त्या वाटेवरचं पहिलं वळण हाकेच्याच अंतरावर माझी वाट पहात तिष्ठत थांबलेलं. पण आता मी निश्चिंत होतो. मनात उत्सुकता होतीच पण ना कसलं दडपण ना अस्वस्थता. कारण सर म्हणाले तसं ‘तो’ होताच माझ्या सोबत आणि त्या वळणवाटेवरही तो असणारच होता सोबतीला.. !)

प्रमोशन प्रोसेस अपेक्षेपेक्षा लवकरच आवरलं आणि जुजबी आवरावर करायलाही पुरेसा वेळ न देताच एक दिवस अचानक मला प्रमोशन मिळाल्याची बातमी आली आणि पाठोपाठ माझी ट्रान्सफर ऑर्डर! 

माधवनगरला झालेली माझी बदली पुढच्या उत्कर्षाच्या वाटेवरचं एक छोटसं वळणंच होतं पण ते इतकं हाकेच्या अंतरावर उभं असेल असं मात्र मला वाटलं नव्हतं. इथं येऊन कसंबसं एक वर्षच होत आलेलं आणि लगेचच निरोप घेऊन बाहेर पडायचा क्षण असा पुढे ठाकलेला!

या एका क्षणाने आमच्या छोटेखानी संसाराची सगळी घडीच विस्कटून जाणार होती. पण त्याचा विचार करायलाही आता फुरसत नव्हती. माझं पोस्टिंग ‘सोलापूर कॅंप’ ब्रॅंचला झालं होतं. गुरुवा‌री ४ आॅगस्टला आॅर्डर आली आणि दोनच दिवसांत म्हणजे शनिवारी रिलीव्ह होऊन मला सोमवारी सोलापूरला हजर व्हायचं होतं!इथल्या ऑफिसरुटीनमधल्या बारीकसारीक गोष्टी मार्गी लावण्यातच दोन दिवस कापरासारखे उडून गेले आणि बॅग भरून मी सर्वांचा निरोप घेऊन बाहेर पडलो.

सोलापूर कॅम्प ब्रॅंचला अनेक आव्हाने माझी वाट पहात होती. मी तिथे जॉईन झालो ती तारीख होती ८ऑगस्ट १९८८!

८-८-८८ हा तारखेतला एकाच संख्येचा विचित्र योगायोग मला गंमतीचा वाटला होता! पण त्यामुळेच माझ्या सर्विस-लाइफ मधे बदलीनंतर विविध कार्यस्थळी मी जॉईन झालो त्या सर्वच तारखा विस्मरणात गेलेल्या असल्या तरी सोलापूर ब्रॅंचमधली ही तारीख मात्र या अपवादात्मक योगायोगामुळे जशी माझ्या कायमची लक्षात राहिलेली आहे तसेच ती 

ब्रँचसुद्धा तिथे घडलेल्या माझी कसोटी पहाणाऱ्या एका प्रसंगामुळे आणि मी त्या कसोटीला उतरल्याची प्रचिती देणाऱ्या नंतर अल्पकाळातच आलेल्या एका अकल्पित, अतर्क्य अशा गूढ अनुभवामुळे माझ्या कायमची लक्षात राहिलेली आहे! त्या अनुभवाने मला स्पर्शून गेलेल्या, चित्तवृत्ती प्रफुल्लित करणाऱ्या आनंदाचे माझ्या मन:पटलावर कोरले गेलेले अमीट ठसे आज पस्तीस वर्षांनंतरही मी आवर्जून जपून ठेवलेत!

‘सोलापूर कॅम्प’ ही पोस्टल कॉलनी, कृषीनगर, विकासनगर या रेसिडेन्शियल एरियापासून हाकेच्या अंतरावर असणारी आमची ब्रॅंच. माझं वास्तव्य कृषीनगरमधे होतं.

 माधवनगरहून सांगलीला फॅमिली शिफ्ट करून शक्यतो सलिलचं माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत तरी बदली होईल तिथे जमेल तितके दिवस मी एकट्यानेच जायचं असं, तातडीनं निर्णय घेणे आवश्यक होतं म्हणून, आम्ही ठरवलं ते सर्वांच्याच दृष्टीने सोयीचं होतं. त्यावेळी आई भावाकडे सातारला होती. रुटीन बसेपर्यंत सोबत म्हणून आमच्या सांगलीच्या बि-हाडी ती येऊन राहिल्यामुळे मला तिकडची काळजी नव्हती. कृषीनगरपासून ब्रॅंच फार तर चालत पाच मिनिटांच्या अंतरावर. रहिवासी क्षेत्रातल्या नागरिकांच्या सोयीसाठी ब्रॅंच सकाळी ८. ३० ते १२. ३० आणि दुपारी ३ ते ६ अशी दोन शिफ्टमधे कार्यरत असे. त्या भागात व्यावसायिक आणि व्यापारी वर्गाचे प्रमाण जवळपास नसल्यासारखेच. त्यामुळे ठेवी-संकलन आणि कर्ज वितरण या दोन्ही आघाड्यांवर यश मिळवणं हे ब्रॅंच-मॅनेजर म्हणून खूप अवघड आणि आव्हानात्मकच होतं. मी चार्ज घेतल्यानंतरचे चार-सहा दिवस ही पार्श्वभूमी अंगवळणी पडण्यातच गेले. स्टाफ तसा पुरेसा होता आणि चांगलाही. जवळजवळ सगळेचजण अनुभवी होते. अपवाद फक्त रिसिव्हिंग कॅशिअर म्हणून काम करणाऱ्या सुजाता बोबडेचा!

सुजाता बोबडे तशी नवीन होती. तिचा सहा महिन्यांचा प्रोबेशन पिरियड नुकताच संपलेला होता. त्यामुळे ती बँकरुटीनमधे अद्याप रुळलेली नव्हती. तरीही या अल्पकाळात अपेक्षित असणारी कार्यकुशलताही ती दाखवू शकत नव्हती. कसलंतरी दडपण असल्यासारखी सतत गप्प गप्प असायची. हेडकॅशिअर श्री. सुहास गर्दे स्वतःकडचं वर्कलोड सांभाळून तिला हातभार लावायचे म्हणून तिचं रुटीन बऱ्यापैकी व्यवस्थित सुरू असे एवढंच. त्यामुळेच सुजाताच्या वर्क-परफॉर्मन्सबद्दल मी फारसा समाधानी नव्हतो. अर्थात अशा कुठल्याच व्यक्तीबद्दलचे पूर्वग्रह मी जाणीवपूर्वक नेहमी तपासून पहात असल्यामुळे माझ्याकडून तोवर कोणतीच कडवट प्रतिक्रिया व्यक्त होणार नाही याची मला काळजी घेणे आवश्यक होते.

त्यानंतर हळूहळू मला मिळत गेलेली सुजाताबद्दलची माहिती मात्र तिच्याबद्दलचे माझे पूर्वग्रह थोडे सौम्य व्हावेत अशीच होती!

रिझर्व्हड कॅटेगरीतून निवड होऊन साधारण वर्षांपूर्वी ती या ब्रॅंचला जॉईन झाली होती. त्याआधीच तिचं नात्यातल्याच एका मुलाशी परस्पर लग्नही ठरलं होतं. मुलगा एम. बी. बी. एस करत होता. त्याचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत लग्न करून घ्यायला त्याच्या घरचे तयार नव्हते आणि तोवर वाट पहायला तिच्या घरचे. यातून काहीच मध्यममार्ग निघत नाहीय हे लक्षात येताच खूप दिवस वाट पाहिल्यानंतर या दोघांनी घरच्या विरोधाला न जुमानता नुकतंच परस्पर रजिस्टर लग्न करून टाकलं आणि दोन्ही घरच्यांनी या लग्नाला ठाम विरोध केला. प्रतिष्ठेचा प्रश्न बनवून दोघांनाही बेदखल केलं. त्यामुळे सुजाता नेहमीच दडपणाखाली असायची. तिने नवऱ्याच्या शिक्षणाची आणि घरखर्चाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेऊन वेगळं बि-हाड केलं. नवऱ्याचं शिक्षण आणि हिची नोकरी अशी तारेवरची कसरत सुरू झाली. मी जॉईन झालो त्याच दिवशी तिचा मॅटर्निटी लिव्हचा अर्ज माझ्या टेबलवर होता! 

हीच सुजाता बोबडे मला लवकरच येणाऱ्या त्या अतर्क्य अशा गूढ अनुभवाला निमित्त ठरणार होती याची त्या क्षणी मला कल्पना कुठून असायला?

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “जागतिक पटलावर गांधीजी…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “जागतिक पटलावर गांधीजी☆ श्री जगदीश काबरे ☆

✅ १९०९ सालापासून प्रख्यात रशियन लेखक लिओ टॉलेस्टॉय गांधीजींना ओळखत होते. कारण त्यांचा गांधीजींशी पत्रव्यवहार होता.

✅ १९२० सालापासून हो चि मिन्ह यांच्यावर गांधींचा प्रभाव होता. भारताची तुलना त्यावेळच्या व्हिएतनाममधील परिस्थितीशी करताना ते एकदा म्हणाले होते, “तिकडे तुमचे एक महात्मा गांधी आहेत, इकडे मी महात्मा गांधी आहे. ” आणखी एकदा, “मी आणि इतर काहीजण क्रांतिकारी आहोत, पण तरीही आम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे महात्मा गांधींचे शिष्य आहोत, ” असेही ते म्हणाले होते.

✅ १९३१ साली जगप्रख्यात टाईम मासिकाच्या मुखपृष्ठावर गांधी झळकले होते.

✅ १९३१ साली अल्बर्ट आईन्स्टाईनने गांधींना पत्र लिहिले. त्यात आईनस्टाईन गांधींना उद्देशून म्हणाले होते: “येणाऱ्या पिढ्या क्वचितच विश्वास ठेवतील की, खरोखरच हाडामांसाचा असा मनुष्य (गांधी) कधी प्रत्यक्ष या पृथ्वीतलावर वावरला होता. “

✅ १९३१ साली महान जागतिक कलाकार चार्ली चॅप्लिन यांनी गांधींची भेट घेतली होती.

✅ १९४० साली नेल्सन मंडेला यांना गांधींच्या अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढा लढता येतो हे समजलं. त्याने प्रभावित होऊन त्यांनी गांधींचा सत्याग्रही मार्ग दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी चोखाळला म्हणून नेल्सन मंडेलांना दक्षिण आफ्रिकेचे गांधीजी म्हटले जाते.

✅ १९४० सालीचा मानव अधिकार कार्यकर्ते मार्टिन ल्युथर किंग यांना गांधीपासून प्रेरणा मिळाली आणि ते वर्णद्वेषाच्या विरोधात लढा उभारला. त्यांना अमेरिकेचे गांधी असे संबोधले जाते.

✅ १९४२ साली लुई फिश्चरने गांधींची भेट घेतली होती आणि त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन १९६२ साली त्यांनी गांधी चरित्र लिहिले.

✅  १९४८ साली एका माथेफिरू हिंदू दहशतवाद्याने गांधीहत्या केली. त्याची दखल जगभरातील सर्व महत्वाच्या वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर घेणारी बातमी प्रसिद्ध केली होती.

✅  १९८२ साली बेन किंग्जले निर्मित आणि रिचर्ड ॲटनबरो दिग्दर्शित चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हा ॲटनबरोला प्रश्न विचारण्यात आला होता की, ‘तुमच्यासमोर जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन, विन्स्टन चर्चिल, माओत्से तुंग, हिटलर असे जागतिक स्तरावरील नेते होते तरीही तुम्ही चित्रपटासाठी गांधींचीच निवड का केली?’ त्यावर त्यांनी दिलेले उत्तर आजही विचार करण्यासारखे आहे. ते म्हणाले, ‘जगातील इतर सगळ्या नेत्यांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी हातात तलवार घेतली होती. फक्त हा एकच असा माणूस आहे जगात की, ज्याने नि:शस्त्र लढा देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. ‘

✅ जगात गांधीजींवर येशू ख्रिस्ताच्या खालोखाल मोठ्या प्रमाणात पुस्तके लिहिली गेलेली आहेत. एवढेच काय पण जगातील बहुसंख्य देशात गांधीजींचे पुतळे उभारले गेलेले आहेत आणि टपाल तिकिटे काढलेली आहेत. जगात अनेक विद्यापीठात गांधींचे विचार शिकवले जात आहेत.

✅ गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी ‘महात्मा’ अशी उपाधी दिली आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘राष्ट्रपिता’ म्हणून त्यांना संबोधत त्यांना मानाची सलामी दिली.

✅ १५ ऑगस्ट १९४७ जेव्हा अख्खा देश स्वातंत्र्य दिनाचा आनंद उपभोगत होता त्याच वेळेला दंगलग्रस्त नौखालीमध्ये गांधीजी निधड्या छातीने एकटे फिरत होते आणि दंगली शमविण्याचा प्रयत्न करत होते. त्यात ते यशस्वीही झाले. म्हणून माउंटबॅटन यांनी त्यांना कौतुकाने ‘वन मॅन आर्मी’ असे म्हटले.

✅ थोडक्यात मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी, उर्फ राष्ट्रपिता, उर्फ आधुनिक भारताचे शिल्पकार, उर्फ अहिंसेचे पुजारी, उर्फ सत्याग्रहाचे जनक किती मोठे होते हे जगाला माहित आहे.

 ❎ तरीही आज बापूजींचा तिरस्कार करणारे कृतघ्नपणे बापूजींच्या चित्रावर पुन:पुन्हा गोळ्या झाडत आहेत.

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दार आणि खिडकी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ दार आणि खिडकी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

व्यवहाराच्या पायावर उभारलेल्या संसाराच्या इमारतीची आखणी कितीही योग्य तऱ्हेने केली तरी काही त्रुटी राहतातच असं दिसतं ! घराच्या भिंती सभोवतालच्या समाजाने बंदिस्त केलेल्या असतात, तर परमेश्वरी कृपेचे छप्पर सर्वांनाच नेहमी सावली आणि आधार देतं! दार- खिडकी हे घराचे आवश्यक, अपरिहार्य भाग! जसे घरातील नवरा बायको !कधी कधी वाटतं चुकांचे कंगोरे आपले आपणच बुजवून घ्यायचे असतात! खिडकी आणि दार यांचे प्रपोर्शन योग्य असेल तर ते चांगले दिसते.. खिडकीने जर दाराएवढं बनायचं ठरवलं तर घराचे रूप बिघडते! अर्थात हे माझं मत आहे!

दार ही राजवाट आहे जिथून प्रवेश होतो, त्याचे मोठेपण मानले तर आपोआपच बाकीचे भाग योग्य रीतीने घर सांभाळतात. खिडकी वाऱ्यासारखी प्रेमाची झुळूक देणारी असली की घरातील हवा नेहमी हसती, खेळती, फुलवणारी राहते. ही खिडकी बंद ठेवली तर चालत नाही, कारण तिची घुसमट वाढते! प्रकाशाचा किरण तिला मिळत नाही. एकेकाळी स्त्रीच्या मनाच्या खिडक्या अशा बंद केलेल्या होत्या! शैक्षणिक प्रगतीच्या सूर्याचे किरण झिरपू लागल्यावर तीच खिडकी आपलं अस्तित्व दाखवू लागली.

बाहेरचे कवडसे तिला- तिच्या मनाला -उजळवून टाकू लागले, पण म्हणून खिडकीचे अस्तित्वच मोठं मोठं करत दाराएवढं बनलं किंवा त्याहून मोठं झालं तर…. इमारतीच्या आतील सौंदर्य कदाचित विस्कटून जाईल! येणाऱ्या वाऱ्या वादळाचा धक्का खिडकी पेलू शकणार नाही.. तिला दाराचा आधार असेल तर जास्त चांगलं असेल!

सहज मनात आलं, ब्रिटिश कालीन इमारतींना दारं आणि खिडक्या दोन्ही मोठीच असत. !जणू काही तेथील स्त्री आणि पुरुष यांचा अस्तित्व फार काळापासून समानतेच्या दिशेने वाटचाल करू लागले, त्या उलट आपल्याकडे वाडा संस्कृतीत दार खूप मोठे असले तरी त्याला एक छोटं खिडकीवजा दार असे, ज्याला दिंडी दरवाजा म्हणत.. त्यातून नेहमी प्रवेश केला जाई! उदा. शनिवार वाड्याचे प्रवेशद्वार जरी मोठे असले तरी आत प्रवेश करण्यासाठी छोटा दिंडी दरवाजा आहेच..

जुन्या काळी स्वयंपाक घरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग बाहेरच्याना दुस्तर होता. तसेच भक्कम पुरुषप्रधान दार ओलांडून किंवा डावलून, चौकट तोडून बाहेर पडणे स्त्रीलाही कठीण होते.

साधारणपणे ४०/५० वर्षांपूर्वी स्त्रीवर कठीण प्रसंग आला तर तिची अवघड परिस्थिती होत असे. शिक्षण नाही आणि आर्थिक स्वातंत्र्य कमी असल्यामुळे संसाराचा गाडा ओढण्याची एकटीवर वेळ आली तर हातात पोळपाट लाटणे घेण्याशिवाय पर्याय नसे.

मागील शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांची परिस्थिती काहीशी अशीच होती. त्यामुळे स्त्री शिक्षण हे महत्त्वाचं ठरलं! शिक्षणामुळे आत्मविश्वास मिळाला, नोकरीमधील संधी वाढल्या..

पण हळूहळू कौटुंबिक वातावरण ही बदलत गेलं. घरातील पुरुष माणसांबरोबरच स्त्रीचं अस्तित्वही समान दर्जाचे होऊ लागले. अर्थातच हे चांगले होते, परंतु काही वेळा स्त्री स्वातंत्र्याचाही अतिरेक होऊ लागतो आणि घराची सगळी चौकट बिघडून जाते.

अशा वेळी वाटते की एक प्रकारचे उंबरठ्याचे बंधन होते ते बरे होते का? अलीकडे संसार मोडणे, घटस्फोट घेणे या गोष्टी इतक्या अधिक दिसतात की दाराचे बंधन तोडून खिडकीने आपलेच अस्तित्व मोठे केले आहे की काय असे वाटावे!

दार आणि खिडकी एकमेकांना पूरक असावे. दाराला इतकं उघड, मोकळं टाकू नये की, त्याने कसेही वागावे आणि खिडकी इतपतच उघडी असावी की हवा, प्रकाश तर खेळता रहावा आणि चौकट सांभाळावी!

संसाराच्या इमारतीचा हा जो बॅलन्स आहे, त्यात दोघांचेही असणारे रोल दाराने आणि खिडकीने सांभाळावे नाहीतर या चौकटी खिळखिळ्या होऊन संसाररूपी इमारतीची वाताहात होण्यास वेळ लागणार नाही……

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जीवन जगण्याची कला :- अध्यात्म – भाग – ३ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

जीवन जगण्याची कला :- अध्यात्म – भाग – ३ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

(श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज म्हणतात की ‘सतत नामात राहावे. ‘ आजच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘range’ मध्ये रहा. ‘Be Connected.’) – इथून पुढे — 

संत तुकाराम महाराजांची एक गोष्ट आहे.

महाराज वारीला जाताना नेहमी आपल्या मित्राला सोबत येण्यास सांगत. तो नेहमी एक कारण सांगे की मी येणारच होतो पण मला माझ्या ओसरीवरील खांबाने धरुन ठेवले आहे. एकदा उत्सुकतेने महाराज त्याच्या घरी गेले आणि बघतात तो काय? त्यांच्या मित्रानेच त्या खांबाला धरुन ठेवले होते. महाराजांनी मित्राच्या ते लक्षात आणून दिले आणि मग तो नित्य वारीला जाऊ लागला. आपलीही अवस्था त्या मित्रासारखीच आहे. फक्त आपल्या ओसरीवरील खांब थोड्या वेगळ्या प्रकारचे आहेत आणि मुख्य म्हणजे आपल्या ओसरीवर अनेक खांब आहेत. एक खांब असमाधानाचा आहे, एक काळजीचा आहे, एक भीतीचा आहे, एक द्वेषाचा आहे, एक आळसाचा, एक कटू वचन किंवा कटू वाणीचा आहे. हे सर्व खांब आपण सोडले तर आपण ‘तुकाराम महाराजां’बरोबर आनंदाने आनंदाच्या वारीला जाऊ शकतो. वारकऱ्यांना वारीत जाऊन जो आनंद मिळतो तो आनंद आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात लाभू शकतो. याची सूत्र आपल्याला अध्यात्मात मिळतात. संतांनी ती सूत्रे आचरणात आणून, पडताळून बघितली आणि मग आपल्या सारख्या सामान्य मनुष्याना सांगितली.

 “ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्तीं असूं द्यावे समाधान”

 — संत तुकाराम महाराज

हे वरील वचन संत तुकाराम महाराज जगले. ते जगले यामागे त्यांना काही सिद्ध करायचे नव्हते, त्यांना काही कमवायचे नव्हते, त्यांना लौकिक संपत्ती नको होती, त्यांना पदप्रतिष्ठा नको होती. म्हणून आज चारशे वर्ष होऊनही त्यांचे नाव अबाधित राहिले आहे. संत तुकारामांची गाढवावरून धिंड काढली गेली, त्यांचा प्रतिसाद होता, गावकरी चांगले आहेत, त्यांनी माझे खूप मोठं कौतुक केले, नाहीतर माझी मिरवणूक कोणी काढली असती ? मला सारा गावं बघता आले, त्यांच्या गळ्यात शिराळे, घोसाळे, आदी भाज्यांच्या माळा घातल्या तेव्हा ते म्हणाले, चला! चार दिवसांची भाजी सुटली”. जन्मजात सावकारी असतानाही दुष्काळात सर्व कर्जांचे कागद त्यांनी खातेदारांना परत देऊन टाकले. कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नसताना, आंदोलने केलेली नसताना, तसा सरकारी आदेश नसताना ‘उस्फुर्त कर्जमाफी’ केली. पुढे सावकारी बुडाली आणि दिवाळे निघाले तेव्हा सुद्धा तुकाराम महाराज यांनी फक्त प्रतिसादच दिला. बायको, मुले, भाऊ जेव्हा दुष्काळाची शिकार झाली, तेव्हा ते म्हणाले,

“बरे जाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली ॥ 

अनुतापे तुझे राहिले चिंतन, जाला हा वमन संसार ॥

बरे जाले जगी पावलो अपमान, बरे गेले धन ढोरे गुरे ॥ 

बरे जाले नाही धरिली लोकलाज, बरा जालो तुज शरण देवा ॥

बरे जाले तुझे केले देवाईल, लेकरे बाईल उपेक्षिली ॥

तुका म्हणे बरें व्रत एकादशी, केले उपवासी जागरण ॥”

त्याच्याही पुढे जाऊन ते म्हणतात,

*”बाप मेला न कळता । नव्हती संसाराची चिंता॥

विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज ॥

बाईल मेली मुक्त जाली । देवे माया सोडविली ॥

विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज ॥ 

पोर मेले बरे जाले । देवे मायाविरहित केले।

विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज।। 

माता मेली मज देखता । तुका म्हणे हरली चिंता ।। 

विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज।।”

इतके कर्तव्यनिष्ठुर होणे आपल्याला जमणार नाही, परंतु आपण प्राप्त स्थितीचा स्वीकार तरी नक्कीच करु शकतो. कारण एकच त्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या प्रारब्धाचा खुल्या मनाने संपूर्ण स्वीकार केला आणि आयुष्यास समर्पक प्रतिसाद दिला. थोडा अभ्यास केला तर हा अलिखित नियम सर्व संतांनी काटेकोरपणे पाळला आहे असे आपल्या लक्षात येईल. संत ज्ञानेश्वर अर्थात माऊली,

संत मीराबाई, अगदी अलिकडील संत गाडगे महाराज, ह्या सर्वांनी आपल्या वाट्याला आलेले प्रारब्ध आनंदाने भोगून संपवले, झालेल्या हालअपेष्टा, यातना, उपेक्षा सहजपणे स्वीकारल्या. अर्थात ‘प्रतिसाद’ देऊन, कोणाही माणसावर आकस न ठेवता. माऊलींनी पसायदानात ‘खळ सांडो’ असे न म्हणता ‘खळांची व्यंकटी सांडो’ असे म्हटले हा सुद्धा प्रतिसादच!!

आयुष्याला तुमच्या तर्कशास्त्राशी वा तत्वांशी काहीही देणेघेणे नाही, ते आपापल्या पद्धतीने प्रवाही होत असते. अखेरीस तुम्हांला या जीवन प्रवाहातून प्रवाहित व्हायचे असते. म्हणून जीवनाला सर्वोत्तम प्रतिसाद द्या. कारण आयुष्य हे कधीही आपल्या तर्कशास्त्रावर चालत नाही.

बदल हा जीवनाचा सर्वश्रेष्ठ नियम आहे. गोपाळ कृष्णाच्या चरित्रात आपल्याला याचे दर्शन होते. ज्याला जन्म होण्याआधीपासूनच शत्रू मारायला टपले होते. जन्म झाल्यावर देखील लगेच स्वतःच्या आईला सोडून दुसऱ्या ठिकाणी जावे लागले, तिथे सुद्धा पुतना मावशी आलीच. आपण कृष्ण चरित्र बघतांना तो अवतार होता हा ‘समज’ मनातून काढून टाकूया. कृष्ण ‘समाजाच्या’ गरजेनुसार आणि लोकांसाठी उपयुक्त असेच जीवन जगला. वेळप्रसंगी स्वतःचे नाव खराब होईल याची त्याने तमा बाळगली नाही. आजही त्याला ‘रणछोडदास’ असे म्हटले जाते. राजपुत्र म्हणून जन्माला आलेला मुलगा एक गवळ्याच्या घरी वाढला, गुरुकुलात राहिला, अगदी सोळा सहस्त्र नारीचा पती झाला, पण प्रत्येक गोष्ट त्याने समाजाचे व्यापक हीत ध्यानात ठेऊन समाज केली. “मैं नही, तू ही” हे सूत्र श्रीकृष्णाने जीवनातील बदल आनंदाने स्वीकारत आजीवन पाळले. म्हणूनच ते ‘पुरुषोत्तम’ झाले. ह्यालाच ‘अध्यात्म’ म्हणतात. म्हणूनच श्रीकृष्ण आज प्रत्येक भारतीयाच्या मनात स्थान प्राप्त करून आहे.

अगदी अलिकडील उदा. घ्यायचे तर लोकमान्य टिळकांचे घेता येईल. मुलगा गेल्याची वार्ता कोणीतरी येऊन टिळकांना सांगितले, लोकमान्य त्यावेळी केसरीचा अग्रलेख लिहीत होते, ते सहज म्हणाले की अग्रलेख पूर्ण करुन येतो. हा धीरोदत्त पणा अध्यात्म जीवनशैलीतूनच येतो. इथे सुद्धा लोकमान्यांनी ‘प्रतिसादच’ दिला आहे आणि परिस्थितीचा आनंदाने स्वीकार केला आहे. स्वा. सावरकरांना ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली, तेंव्हा त्यांचे पाहिले उद्गार काय होते ? “पन्नास वर्षे ब्रिटिशांचे राज्य टिकेल ?” हा प्रतिसादच होता. सर्व क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी, शास्त्रज्ञ ‘अध्यात्म’च जगत आलेले आहेत.

‘प्रतिक्रिया’ ही अपरिहार्यता असू शकते पण ‘प्रतिसाद’ नेहमीच मनुष्याची खिलाडू वृत्ती दाखविणारा, उस्फुर्त आणि सकारात्मक असतो. जीवनाकडे परमेश्वराची ‘लीला’ म्हणून पाहणारा असतो. आत्मविश्वास दाखविणारा आणि जगण्याची उमेद वाढविणारा असतो.

म्हणोन आळस सोडावा ।

येत्न साक्षेपें जोडावा ।

दुश्चितपणाचा मोडावा ।

थारा बळें ।। दा. १२. ९. ८।।

 — समर्थ रामदास

आपण दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न अनेक वेळा करुन बघितला आहे. त्यात आपण किती यशस्वी झालो हे आपल्याला चांगलें कळले आहे. त्यामुळे आपण आता स्वतःला बदलूया, कारण ‘बदल स्वीकारणे’ आणि ‘स्वतःत बदल करणे’ हे दोन्ही आव्हानात्मक आहे. आपण बदललो की त्यामानाने जग बदलतेच.

“नजरे बदली तो नजारे बदले।

नाव ने कष्ती बदली तो किनारे बदले।”

एक दगडाचा व्यापारी होता. त्याच्याकडे विविध रंगाचे, विविध दर्जाचे, विविध आकाराचे दगड विकायला होते. एक भला मोठा दगड त्याच्याकडे बरेच दिवस पडून होता. तो दगड बरेच दिवस विकला जात नव्हता. एकदा एक कारागीर त्याच्याकडे आला. त्याला म्हणाला हा दगड मला देता का? बरेच दिवस तो पडून होता, म्हणून तो म्हणाला फुकट ने कारण त्याने माझी जागा अडवली आहे. कारागिराने तो दगड नेला, त्यातून सुंदर शिल्प तयार केले. एकदा व्यापारी त्याच्याकडे गेला असताना त्याने शिल्प बघितले. तो सुद्धा आश्चर्य चकित झाला. त्याने कारागिराचे तोंड भरुन कौतुक केले. म्हणाला, “तुम्ही चांगले शिल्प घडवले. त्यावर तो कारागीर म्हणाला की त्या दगडात आधीपासूनच ते शिल्प होते, मी त्याच्या आजूबाजूचा अनावश्यक भाग काढून टाकला”.

आपण सुद्धा ईश्वराचे अंश आहोत, लेकरे आहोत. आपल्यातील अनावश्यक भाग आपल्याला काढून टाकता आला तर आपल्या जीवनांचे देखील सुंदर शिल्प निश्चित बनू शकेल, यात शंका नाही. फक्त अनथक प्रयत्न अत्यावश्यक आहेत. नाहीतर मॉर्निंग walk ला जाण्यासाठी घड्याळाला गजर लावणे आणि सकाळी गजर वाजला की सवयीने तो बंद करणे हाच बरेच लोकांचा ‘व्यायाम’ असतो, तसे व्हायला नको.

अध्यात्माच्या आजच्या कालानुरूप नवीन व्याख्या कराव्या लागणार आहेत, त्या खालीलप्रमाणे असू शकतील.

१. ‘असेल तर असो, नसेल तर नको’ म्हणजे अध्यात्म

२. ‘हवे नको पण’ जाणे म्हणजे अध्यात्म …. विनातक्रार स्वीकार्यता (Unconditional acceptance) म्हणजे अध्यात्म.

३. कुटुंबाची, समाजाची, देशाची ‘आई’ होणे म्हणजे अध्यात्म, उदा. सिंधुताई सपकाळ उर्फ माई.

४. ‘मेरी झाशी नही दुंगी’ म्हणणे आणि तशी कृती करणे म्हणजे अध्यात्म.

५. स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणे म्हणजे अध्यात्म.

६. ‘श्रवण’ केल्याप्रमाणे कृती करणे म्हणजे अध्यात्म.

७. आपल्या कलागुणांचा, उपलब्ध साधन संपत्तीचा समाजासाठी उपयोग करणे म्हणजे अध्यात्म. इ.

‘जीवन जगण्याची कला- अध्यात्म ‘.. ह्या लेखाचा समारोप एका कवितेने करतो.

*

आत आपुल्या झरा झुळमुळे निळा स्वच्छंद।

जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद।।धृ।।

*

घन धारातुनी ख्याल ऐकतो रंगुनी मल्हाराचा।

बघता बघता मोरपिसारा साऱ्या संसाराचा।

मनात पाऊस बरसे उधळीत मातीचा मधुगंध।।१।।

*

दुःखाला आधार नको का? तेही कधीतरी येते।

दोस्त होऊनी हातच माझा आपुल्या हाती घेते।

जो जो येईल त्याचे स्वागत हात कधी न बंद ।।२।।

*

झाडाची झुलणारी फांदी कधी लावणी भासे।

साधा कोरा कागदही कधी चंद्र होऊनी हासे।

सर्वत्रच तो बघतो धुंदी, डोळे ज्याचे धुंद ।।३।।

*

कधी कुणाचे आसू पुसता बोटांनी हळुवार

हात होतसे वाद्य सुरांचे पाझरती झंकार

प्रेमाच्या या गाण्यासाठी प्रेमाचा हा छंद ।।४।।

*

कवी : श्री. मंगेश पाडगावकर 

– समाप्त – 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares