मराठी साहित्य – विविधा ☆ दीप ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

 ☆ विविधा ☆ दीप ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

‌दीप म्हणजेच दिवा. अंधारातून प्रकाशाकडे नेणारे एक माध्यम, साधन! पृथ्वीच्या उत्पत्तीपासून जगाच्या नाशापर्यंत ज्याचे अस्तीत्व असणार आहे तो सूर्य मानवाच्या आयुष्यातला प्रथम दीप, दिवा ! काही दिवे अत्यंत दीप्तीमान असतात तर काही अत्यंत शांतपणे तेवणारे असतात.सूर्य हा असाच अत्यंत दीप्तीमान दिवा ज्याशिवाय आपले जगणे अशक्य!

मानवाच्या गरजेतून निर्माण झालेला पहिला दिवा! दिवा म्हणजे गारगोटीच्या घर्षणातून निर्माण झालेली ठिणगी. मानवाला लागलेला अग्नीचा शोध ही दिव्याची सुरवात होय. दिवटी, पणती, सम ई, कंदील, बत्ती आणि विद्युत अशी दीप, दिव्याची अनेक रुपे म.वि. कुलकर्णी यांच्या कवितेत आढळतात.

‌अंधार नष्ट करून प्रकाश देणे हे दिप, दिव्याचे काम असून त्या प्रकाशाने आपल्याला आनंद होतो. मग तो अंधार आसमंतातील असो वा मनातील !

‌सूर्य अस्ताला गेला की देवापुढे दिवा लावून ‘ शुभंकरोती कल्याणम्’ म्हणायचे संस्कार आपल्यावर लहानपणीच झालेले आहेत. त्यातील ‘दिव्या दिव्या दिपत्कार, कानी कुंडलं मोतीहार’ ही ओळ आपल्याला दीपज्योतीचे महत्व सांगते.देवघरात सम ईत तेवणारी दोन वातींची, दिव्यांची ज्योत म्हणजे देवाच्या कानातील प्रकाशमान कुंडल असावीत आणि त्या  ज्योतीभोवती निर्माण झालेले तेजोवलय म्हणजे मोत्यांचा हारच वाटतो.ते तेजोवलय आपणआपल्या डोळयांत साठवितो. ही साठवण आपल्याला बरेच काही देऊन जातो.

आपल्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा दीप म्हणजे ज्ञानदीप आपल्या बौद्धिक कुवतीप्रमाणे प्रकाशित होऊन आपले आयुष्य उजळून टाकतो.

काही वेळा बौध्दिक ज्ञानदीप प्रकाशित होणारा असूनही एखाद्याच्या आयुष्यात अंधारी रात्र येते त्यांमुळे त्याच्या स्वप्नांचे आशादीप मंदावतात तर कधी कधी नैराश्य आले असताना अचानक आशादीप प्रज्वलित झालेलेही पहावयास सापडतात.

पूर्वी वंश वृध्दीसाठी वंशदिप म्हणजे पुत्रजन्माला फार महत्व होते. आता काळ बदलत चालला असून दीपाचे दुसरे रूप पणती लोक आनंदाने स्वीकारू लागले आहेत.

दीप कोणताही असो तो समाजाला,मनाला प्रज्वलित करत असतो. अर्थात दीपाचे प्रज्वलित होणे त्याला मिळणाऱ्या तेलवातीवर अवलंबून असते हे विसरून चालणार नाही दीपावलीच्या सणाच्या निमित्ताने आपल्या मनातला सर्व अंधकार संपून जावा, प्रत्येकाने आपला मनाचा दीप संस्कार, सत्कार्यासाठी प्रज्वलित ठेवण्याचा प्रयत्न करत सतत, ‘दिव्या दिव्या दीपत्काराचे स्मरण ठेवणे गरजेचे आहे आपली गरज सतत स्मरणात रहावी यासाठीच दीपांची आरास! दीपावली साजरी करावयाची !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वसुबारस ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ विविधा ☆ वसुबारस ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

? दिन दिन दिवाळी—१ ?

आज पासून दिवाळीचा सण सुरू होतो आहे. गेल्या सात-आठ महिन्यातील सणांप्रमाणे दिवाळी सणावर सुध्दा करोनाच्या साथीचे सावट आहे. उत्सवाला धास्तीची किनार आहे. पण सर्व नियम पाळत, स्वच्छता राखत, अगदी साधेपणाने आपण हा सण साजरा करणार आहोत. सामाजिक अंतर राखत पण  मनामनातलं अंतर कमी करत नाती जास्त सुदृढ करणार आहोत. कारण प्रत्येक सणाचे हेच तर प्रयोजन असते. हा तर ‘दिवाळीचा सण’

दिवाळी हा फक्त एकच उत्सव नाही बरं का ! तर हे उत्सवांचे स्नेहसंमेलन आहे.  हा फक्त एकाच देवतेचा उत्सव नसून तो लोकव्यवहाराशी जास्ती जोडलेला आहे. मुख्य म्हणजे हा प्रकाशाचा उत्सव, नात्यांचा उत्सव, लक्ष्मीचा उत्सव, निसर्गाचा उत्सव,  विजयाचा उत्सव असे  अनेकरंगी पदर असणारा उत्सव आहे.

अश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया असे सहा दिवस हा उत्सव साजरा होतो. त्यातला पहिला दिवस म्हणजे ‘गोवत्स द्वादशी’.  यालाच “वसुबारस ” असेही म्हणतात.  आपल्या संस्कृतीत गाय फार पवित्र मानली जाते.  लक्ष्मीच्या अंशापासून उत्पन्न झालेली सवत्स धेनु म्हणजे “सुरभि”. हीच गोमातांची अधिदेवता आहे.  दिवाळीत हिचे पूजन केले जाते. एरवी सुद्धा ‘गो-ग्रास’ म्हणून पोळी-भाताचा नैवेद्य काढून ठेवला जातो.  वसुबारस तर  काय गायींचाच उत्सव त्यामुळे या दिवशी तिचे विशेष कौतुक होते.

यानिमित्ताने प्राण्यांचे रक्षण करणे, निसर्गाच्या प्रती ऋण  व्यक्त करणे हा मुख्य  संदेश दिलेला आहे. हाच या सणामागचा मुख्य उद्देश आहे. अनेक उपकारक प्राण्यांचे ऋण आपण व्यक्त करतो , त्यातलाच हा एक दिवस. या दिवशी गायींचा गोठा स्वच्छ करून रंगवतात. तिथे पणत्या लावतात.  मुख्य म्हणजे गायींना ओवाळून नैवेद्य देतात.  त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. ग्रामीण भागात या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गायीसमोर गाणी म्हटली जातात. गाण्यांमधून गाईच्या गुणांचे,  शेतीच्या कामांचे वर्णन केलेले असते. या गाण्यांमधून एकमेकांना कोडी घालण्याचा खेळ खेळला जातो.

कृतज्ञता व्यक्त करणे हा आपल्या भारतीय संस्कृतीचा स्थायीभाव आहे. वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने निसर्गाचे पूजन करून त्याच्या प्रती ऋण व्यक्त केले जाते. आपला देश हा कृषिप्रधान देश आहे आपल्या संस्कृतीत गाई-वासरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या निसर्गातील प्राणिमात्रांचे रक्षण केले पाहिजे. कोणत्याही कारणाने,  कोणत्याही प्रकारे निसर्गाला हानी पोहोचवायची नाही.  ध्वनी-वायू प्रदूषण रोखले पाहिजे. निसर्गाचे रक्षण, संवर्धन केलं पाहिजे. हा संदेश या सणातून घ्यायचा आहे. निसर्ग संवर्धन मोहीम,  वसुंधरा महोत्सव या अभियानांचे हेच उद्दिष्ट आहे.  “निसर्ग धरतीचे लेणे हो ! त्यांचे रक्षण करणे हो !!” हे कायम स्मरणात ठेवायला हवे.

तेव्हा या निमित्ताने आपण पुन्हा निसर्गाच्या जास्ती जवळ जाऊ या. त्याच्याशी आपले नाते पुन्हा घट्ट करू या.  दिवाळीची सुरुवात आनंदाची करू या.

शुभ दीपावली.  ?

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जीवनगाणे गातच रहावे ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ. मेधा फणसळकर

☆ विविधा ☆ जीवनगाणे गातच रहावे ☆ डॉ मेधा फणसळकर

परवा पुस्तकांच्या कपाटातून सारखी खुडबुड ऐकू येऊ लागली. मनात म्हटले ,“एवढा बंदोबस्त करुनही खारुताईने आपल्यावर कुरघोडी केलेली दिसतेय. पुन्हा घरटे बांधले वाटते.” असे म्हणून त्या बाजूचे दार उघडले तर खारुताई ऐवजी उंदीरमहाशयांनी दर्शन दिले. मी घाबरून पटकन दार बंद करुन घेतले. आमच्या  कपाटाच्या मागच्या बाजूला खिडकी आहे.   ती एका बाजूने कायम थोडीशी उघडी राहते आणि त्याच चोरवाटेने प्रवेश करुन या खारुताईनी दोन वर्षे आपले बस्तान बसवले होते. बिचारी मोठ्या कष्टाने घरटे बनवते आणि तेव्हा लेकुरवाळी पण असते. म्हणून मी पहिल्या वर्षी तिचे बाळंतपण संपेपर्यंत धीर धरला. नंतर सर्व बाजूनी कडेकोट बंदोबस्त केला. पण बाईसाहेब माझ्यापेक्षा हुश्शार निघाल्या. अगदी लहान राहिलेल्या फटीतून त्यांनी पुढच्या वर्षी पुन्हा आपला कार्यभाग साधला. यावर्षी मग मी अधिक जोमाने बंदोबस्त केला. आणि बाईसाहेब तिकडे फिरकल्या नाहीत. मी एकदम आनंदात होते. आणि एक दिवस दुसऱ्या बाजूचे कपाट उघडले तर बाईसाहेब दिमाखात घरट्यात बसून माझ्याकडे “ जितम् मया।” अशा अविर्भावात बघत होत्या. तिच्या जिद्दीला मी सलाम केला आणि बाईसाहेब निघून गेल्यावर त्यांच्या घरात आश्रय घेतलेल्या या  मूषकमहाशयांनी दर्शन दिले. आता यांचा बंदोबस्त कसा करायचा या विवंचनेत मी असतानाच आणखी एक समस्या उद्भवली. आमच्या बाथरूमचे आउटलेट तुंबू लागले होते. आणि चाचपणी केली असता लक्षात आले की बाथरूमच्या बाहेरच्या बाजूला उगवलेल्या झाडाच्या मुळ्यांनी पाण्याशी मैत्री करत त्या पाईपमध्ये हात- पाय पसरले होते. ते बघितले आणि मनात विचार आला ,“शेवटी  प्रत्येक जीवाची ही जगण्याचीच तर धडपड आहे. जगण्याची हीच उर्मी त्याची संजीवनी देत असते.”

मध्यंतरी  परदेशातील एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. एका तीन ते चार वर्षाच्या  मुलाचे आई- वडील एका विघातक घटनेत मृत झाले होते आणि ‛मृत्यू’ या शब्दाचाही अर्थ माहीत नसलेला  आणि आपल्या आईच्या आठवणीने  रडणारा तो चिमुरडा बघून वाटले,“ कसे जगणार हे पिल्लू ?” पण तरीही तो जगतो आहेच की! आपल्या आजूबाजूला पण अशी अनेक उदाहरणे आपल्याला दिसतात. आपण त्यावेळी हळहळतो आणि काही दिवसांनी विसरून पण जातो. पण त्या जीवांची जगण्याची धडपड आणि उर्मी तशीच असते. म्हणूनच जीवनप्रवाहसुद्धा अविरत चालू राहतो.

आज अनेकदा पर्यावरणप्रेमी- अभ्यासक सतत आपल्याला म्हणजेच मानवाला जाणीव करुन देत आहेत की आम्ही पर्यावरणाचा ऱ्हास करत आहोत आणि पर्यायाने तेथे निवास करणाऱ्या जीवसृष्टीचा पण! गोष्ट शंभर टक्के खरीच आहे. पण एका दृष्टीने हीसुद्धा माणसाची जगण्याचीच धडपड नाही का? पण त्यात मूलभूत फरक हा आहे की बाकीची जीवसृष्टी आपल्या गरजेपुरताच निसर्गाचा विनियोग करते. आम्ही मात्र आमच्या भौतिक सुखाच्या हव्यासापोटी त्या संपत्तीचा हवा तसा उपयोग करुन घेत आहोत आणि म्हणूनच ही केवळ जगण्याची उर्मी न राहता हाव बनली आहे. म्हणूनच कदाचित बाकीच्या सजीवांना जगण्यासाठी नवनवीन मार्ग शोधावे लागत आहेत. सिंधुदुर्गमध्ये उद्भवलेला हत्तींचा प्रश्न , हल्ली वारंवार ऐकू येणाऱ्या मानववस्तीतील बिबट्याचा वावर, माझ्या घरात घरटे बांधणारी खारुताई किंवा भिंतीत मूळे रुजवणारी वनस्पती हे त्याच समस्येतून निर्माण झालेले प्रश्न आहेत. जगण्यासाठी त्यांनी शोधलेले हे नवीन पर्याय आहेत.अर्थात सजीवांची खासियत हीच आहे की आहे त्या परिस्थितीला तोंड देत जीवन चालू ठेवायचे. आधार शोधून घेऊन नवीन मार्ग निवडायचा! तर काहीवेळा आमच्यातीलच सहृदय व्यक्ती स्वतःहून आधाराचा हात पुढे करतात.म्हणूनच अनाथ मुलांचे आश्रयस्थान एखादी सिंधुताई सकपाळ बनते, तर आमच्याच सिंधुदुर्गातील संदीप परब वृद्धांना सहारा देणारा आधारवड  बनतो. दिव्यांगाना आपल्या मायेची ऊब देत एखादी नसीमादीदी स्वतःच्या शारीरिक मर्यादांवर मात करत त्यांना नवीन पंख देते. एखादी तमक्का  आयुष्यभर वृक्षांना मुले मानून त्यासाठी देशभरात बिया रुजवत फिरते आणि लाखो वृक्षांना जन्म देऊन त्यांची आई बनते. तर जंगल अधिवास  नष्ट होऊ नये म्हणून एखादा आसाममधला मोलाई अख्खे जंगल निर्माण करतो.  तात्पर्य काय तर प्रत्येक सजीवाला जगण्याचा अधिकार आहे आणि  जगण्याची उर्मी हा त्याचा स्रोत आहे.

 

©️ डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नकोसा तो लखपती ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ.पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ☆ विविधा ☆ नकोसा तो लखपती ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

एका देखण्या आणि हुशार कुत्र्याने स्वतःच्या कर्तृत्वावर लखपती होऊन जागतिक कीर्ती मिळविलेली कुठे ऐकली आहे का ?..होय आहे!!!

एका वयस्कर जोडप्याने एक का़ँली़ जातीचा कुत्रा पाळला होता त्याचं नाव पाँल. अत्यंत हूड होता. तो कोणाच्याही अंगावर जायचा. मिळेल ते  फाडायचा. गाड्यांच्या मागे धावायचा. वयस्क असल्याने मालकाला त्रास व्हायला लागला. अखेर त्यांनी त्याला ‘श्वान प्रशिक्षण’ केंद्रात दाखल केले. थोडा मोठा असल्याने नाखुषीतच त्यांनी त्याला ठेवून. घेतले पाँलचे तेथे शिक्षण सुरू झाले.एका महिन्यातच ‌शिक्षक विदरवँ त्याच्यावरक्स त्याच्यावर बेहद्द खुश झाले .आता तो नविन मालकाचा, शिक्षकाचा लाडका झाला. त्याचा हूडपणा कमी झाला.पाच ते सहा महिन्यात अत्यंत अवघड कामे तो चपळाईने आणि डौलदार पणे करायला लागला. पाणीदार डोळे,  सुळसुळणारे पिंगट केस, पन्नास पौंड वजन यामुळे तो देखणा आणि रुबाबदार दिसायला लागला.

सात आठ महिने गेले. एक दिवस पाँ आणि त्याचे शिक्षकल आणि त्याचे शिक्षक विदरवँक्स यांना सुवर्णसंधी आली. उज्ज्वल भविष्य दिसायला लागलं. चित्रपटासाठी ‘काँली जातीचा कुत्रा पाहिजे’  अशी जाहिरात आली. हॉलीवूडमध्ये निवड करण्यासाठी 300 कुत्रे आले होते. पाँलने स्टुडिओमध्ये उत्तम आणि अवघड कामे रुबाबात करून दाखवून वाहवा व टाळ्या मिळविल्या. अनेक चाचण्या झाल्या आणि त्यात पाँल हा चित्रपटासाठी निवडला गेला. चित्रपटाचे नाव “लँसी कम होम” या चित्रपटाचा नायक म्हणून पाँलचे काम सुरू झाले. एका चाचणीत नदीमध्ये होडीतून उडी मारून नदीच्या दुसऱ्या टोकाला पोचताच थकल्यासारखे रांगत जाऊन नंतर उभं रहायचं हे काम त्याने अतिशय उत्तमरीत्या वठविले.  विदरवँक्सना धन्यता वाटली आणि आनंदाने डोळ्यात आनंदाश्रू तरळू लागले .चित्रपट अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी ठरला. तो काळ 1943. लँसीचे आणखी चित्रपट काढण्यासाठी अनेक देशातून पत्रे येऊ लागली. अनेक करारही झाले. आणखी चित्रपट यायला लागले .आता लँसीची स्वतःची कमाई किती झाली असेल ?? आश्चर्य वाटेल…!!!

वार्षिक 50000 डॉलर (1945-46)

दुसऱ्या महायुद्धाच्या लढाईत शत्रूचे संकट पुढे असताना सैनिकांना मार्गदर्शन करून त्यांचे प्राण वाचविण्याचे काम, बर्फाळ प्रदेशात सैनिकांबरोबर पँराशूट मधून उतरून शत्रूला जेरीस आणण्याचे काम लँसी-पाँलने अतिशय उत्तमरितीने पार पाडून शाबासकी मिळवली. काहीवेळा प्रेक्षकात हास्याचे फवारे उडविले.तसेच डोळ्यात अश्रू उभे करण्याची खुबी आणि तंत्रही त्याला जमले होते. त्याच्या देखण्या रुपाची आणि कर्तबगारीची स्तुती करणारी हजारो पत्रे यायला लागली. त्याच्या पायाचा ठसा आणि फोटोसाठी मागण्या यायला लागल्या.त्याच्या रेखा चित्रांची मासिके निघाली. त्याच्या स्वामीनिष्ठेच्या गोष्टी शाळेतले शिक्षक विद्यार्थ्यांना सांगायला लागले. त्याच्या निष्ठेवर धर्म उपदेशक प्रवचन सांगायला लागले . लँसी-पाँल हॉलीवूडचा एक अमोल कुत्रा होता. केवळ श्वान प्रदर्शनात उपस्थित राहण्यासाठी त्याला दिवसाचे 1000 डॉलर्स मिळत होते. आता चित्रीकरणासाठी लांबचा प्रवास तो स्वतःच्या विमानातून, रेल्वेचा प्रवास वातानुकूलित खास डब्यातून आणि इतर प्रवास खास बांधणीच्या गाडीतून करत होता.

लँसीच्या मोठेपणाचे आणि समजूतदारपणा चे उदाहरण सांगता येईल. चित्रीकरणासाठी त्याचा कॅनडाला मुक्काम होता. त्यावेळी जखमी झालेल्या सैनिकांच्या हॉस्पिटल मध्ये जवानानीच पाँलला आमंत्रित केले .त्याचे चित्रपट पाहून सैनिकांना त्याला प्रत्यक्ष पहाण्याची उत्सुकता होती. हॉस्पिटल मध्ये पाँल-लँसी फिरू लागला. सैनिकांना खूप आनंद झाला. त्यांचे चेहरे खुलले. अनेक जण त्याला हात लावण्याची इच्छा व्यक्त करू लागले .निराश होऊन शय्येवर पडलेला सैनिक त्याला पहाताच उठून बसला. त्याने सैनिकाचा हात चाटून शेक हँड केले. सैनिकाला आनंद  झाला .डॉक्टर आणि औषधाचे काम पाँल-लँसीने केले.

मूळ मालकाला नकोसा झालेला, शिक्षकांनीही थोड्या नापसंतीने ठेवून घेतलेला पाँल-लँसी लखपती झाला.

© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

पत्ता- ‘पुष्पानंद’ बुधगावकर मळा रस्ता मिरज, जि. सांगली

फो नं. ०२३३-२२१२१५१ मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गतकाल..पुढील आयुष्याचे श्वास… ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ गतकाल..पुढील आयुष्याचे श्वास… ☆ श्री अरविंद लिमये ☆

आत्ताचा श्वास उच्छवासात रुपांतर होताच भूतकाळात जमा होत जातो. कधीच न थांबणारं हे निरंतर चक्र. . !सृष्टीच्या उत्पत्तीपासून सतत दमछाक न होता एका लयीत ते फिरतं ठेवण्याची ही किमया अचंबित करणारीच. भूतकाळात जमा होणाऱ्या या आपल्या साऱ्या श्वासांचा चोख हिशोब ठेवण्यासाठीचं आवश्यक साॅफ्टवेअर या व्यवस्थेत In Builtच असतं. तिथं ना निष्काळजीपणा ना चूकभूल. आपल्या प्रत्येक बऱ्यावाईट कृतीचीच नव्हे तर त्या त्या क्षणी मनात उमटलेल्या पण कृतीत न उतरलेल्या बऱ्या-वाईट विचारांचीही त्याच क्षणी नेमकी अचूक नोंद होत असतेच. या नोंदी म्हणजेच आपली कर्मे. याचाच अर्थ आपला भूतकाळ आपणच घडवत किंवा बिघडवत असतो आणि त्याचीच कर्मानुसार कडू-गोड फळं भविष्यकाळात कर्मफलांच्या परिपक्व होण्याच्या क्षमतेनुसार आपल्यालाच मिळणार असतात. ती स्विकारण्याचा किंवा नाकारण्याचा कोणताच अधिकार आपल्याला नसतो. सत्कर्माच्या गोड फळांच्या आस्वादाचं सुख उपभोगणारे आपणच आणि कडू फळांचे भोग भोगणारेही आपणच. भविष्यकाळांत काय घडणाराय हे आपल्याला माहित नसतं असं म्हणतात. पण हे पूर्ण सत्य नव्हे. कारण आपल्या कर्मांच्या नियतीच्या नोंदवहीत होणाऱ्या नोंदी त्या त्या क्षणी आठवणींच्या रुपात आपल्या मनातही होत असतातच. त्यामुळे आपल्या बऱ्यावाईटाचे आपणच साक्षीदार असतो आणि म्हणून त्याची जबाबदारीही आपलीच. या गतकाळातल्या चांगल्या आठवणी आपला भविष्यकाळ सुखकर करीत असतात. नकोशा आठवणी सोईस्करपणे विसरायचा प्रयत्न करणारेही त्या आठवणीरुपी कर्माची कडू फळं टाळू शकत नाहीत.

याचाच अर्थ आपला भविष्यकाळ आपल्याला माहित नसला, तरी तो घडवणारे आपल्या आयुष्याचे शिल्पकार आपणच असतो. आपला प्रत्येक श्वास  उच्छवासाबरोबरच भूतकाळात जमा होत असतो. तो सत्कर्माने सजलेला हवा कि कुकर्माने बाधित हे ज्याचे त्याने ठरवायचे. पण हा निर्णय योग्य आणि सुखकर व्हायला हवा असेल तर आपणच क्षणोक्षणी निर्माण करीत असलेला आपला गतकाल हाच आपला भविष्यकाळातला श्वास असणार आहे हे विसरायचं नाही. . !!

 

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नातं – आईची आई ☆ सौ.दीपा पुजारी

☆ विविधा ☆ नातं – आईची आई ☆ सौ.दीपा पुजारी 

एकावर एक दोन ड्रेस चढवून वर स्वेटर, त्यावर ओव्हरकोट, डोक्याला माकडटोपी, हॅंडग्लोव्हज, मोजे, बूट अशी जय्यत तयारी करून मी तयार झाले. तेव्हढ्यात हातात गरम चहाचा कप घेऊन माझी लेक समोर ऊभी. सरणारा ऑगस्ट महिना. डब्लिन मधील एक पहाट. डब्लिनवासियांसाठी प्लेझंट पण आमच्यामते गारठलेली पहाट. मुलीने हट्टाने एक दिवसाची Galway-Belfast-Gaints Causeway ची खास आमच्या साठी ठरवलेली ट्रीप. थोड्या नाईलाजानेच मी ऊबदार, मऊ दुलईतून बाहेरआले व स्वत:ची तयारी करू लागले. हे तर केंव्हाच तयार होऊन बसलेले.

हसतमुखपणे गुडमॉर्निंग म्हणून तिने कप मला दिला व ती पुन्हा लगबगीने किचनकडे वळली.काल रात्रीच तिने  आलू पराठे करून ठेवले होते . सोबत शिरा व इतरही किरकोळ खाऊ होता. छानशा पिशवीत सगळे पॅक करून तयार होतेच. “चला चला ,इथे बस  वेळेवर सुटते हं. बाबा, आई आवरा लवकर.” ती हातात लॅच की घेऊन ऊभी.

तिने आम्हांला बाहेर काढलेच. रस्यातून जाताना तिच्या सूचना सुरु होत्याच. काय बघायचे ? कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या? बस कुठे थांबेल? गाईड कशी माहिती सांगेल? इथले नियम कसे कडक असतात. वगैरे….वगैरे….

“आई, २० मि. दिली असतील एखाद्या स्पाॅटला तर १५. मि. बस कडे ये हं. २० मि. म्हणजे अर्धा पाऊण तास नाही हं. वेळ लागला तर ओरडून घेशील मग मूड जाईल तुझा.”

“बाबा,एखाद्या ठिकाणी खूप चालावे लागले पण दमलात तर बसून रहा बाजूच्या बाकावर . नाही चालावे वाटले तर राहू दे.” असे म्हणत तिने स्वत:चे एक कार्ड बाबांच्या हातात ठेवले. बरोबर थोडे युरोही होते. “आई बाबा चहा काॅफी घ्या. काही खावेसे वाटले तर खा. आणी खरेदी ही करा हं.”

मी बसच्या खिडकीतून बाहेर पाहिले. ती हसत हसत हात हलवून निरोप देत होती. ही एव्हढी मोठी कधी झाली? माझ्या नजरेसमोर तर अजून ऊड्या मारत स्कूल युनिफॉर्म मधलीच आहे. शाळेच्या सहलीला जाताना तिची बस दिसेनाशी होईपर्यंत गेटजवळ मी ऊभी असायची हात हलवत. तिचा ऊल्हासित चेहरा, मैत्रिणींच्या बरोबर चाललेल्या गप्पा, टाळ्या, आणी इतक्या मुलींमधूनही एव्हढ्या किलबिलाटात ही ओळखता येणारी तिची हास्य लहर!! तिचा तो अवखळपणा, अल्लडपणा, निरागसपणा जाऊन हा बदल कधी झाला? दुसर्‍या ईयत्तेत असताना एकदा वर्गात रडत होती. बाईंनी कारण विचारले तर आईची आठवण आली म्हणाली. एव्हढ्या लांब परक्या जगात,परक्या वातावरणात कसा निभाव लागणार हिचा? कधी काही बोलली नाही. आज जग फिरुन अनेक अनुभव घेऊन अधिकच समंजस झालीय. आणी आज तर हिने नात्यांचीच अदलाबदल केली.

ही तर माझीच आई झाली. सुजाण, सुशिक्षित, कर्तबगार तरीही आपल्याच आई बाबांची छोटी आई!! मला वाटले हा दिवस लवकर संपावा व घरी जाऊन या ‘आईचीच आई झालेल्या आईच्या’ मांडीवर डोके ठेऊन शांत झोपावे. पिकनिक हून आल्यावर ती दमून शिरायची तसे……अगदी तसेच…….

© सौ. दीपा नारायण पुजारी

फोन.नं    ९६६५६६९१४८

email :[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सत्यवानाची सावित्री ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ विविधा ☆ सत्यवानाची सावित्री  ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

जवळपास गेली चाळीस वर्षे इंदू माझ्या घरी काम करते ती माझ्याकडे आली तेव्हा आम्हा दोघींची मुले पहिलीत होती आज आम्हा दोघींच्या घरी गोकुळ आहे.

इतक्या वर्षांचा ऋणानुबंध आमचा! आता ती आमच्या कुटुंबातीलच एक झाली आहे. स्वतःचं एवढं मोठं कुटुंब असूनही ती माझ्या घरात रमलेली असते. आणि माझ्यात गुंतलेली!

तिचा सगळा जीवनप्रवास तसा खडतरच! अशिक्षिततेची झालर असलेलं जिणं तिच!! ठेंगणी ठुसकी अशी इंदू कष्ट करून नीटनेटका संसार करणारी अशी.. ‘तुमच्या वानी तुमच्या वानी’असं म्हणून जमेल तेवढं माझं अनुकरण करणारी . अशी ही इंदू……

माझ्याच घरात तिने स्वयंपाकाचे धडे घेतले. जेवढ्या म्हणून माझ्या गोष्टी तिने डोळ्याने पाहिल्या हाताने शिकल्या त्याचं तिला अप्रूप आहे. वेळोवेळी केलेल्या मदतीचे भान ती ठेवते पण तिच्या नशीबाची गाडी मी पळवू शकत नाही हे तिला चांगलेच ठाऊक आहे.

तिचा नवरा पहिल्यापासूनच व्यसनी…रोजची भांडण रोज वाद, कधीकधी होणारा नशेचा अतिरेक हे मी इतकी वर्ष पाहात आले आहे जीवनाचा समतोल राखत ती बिचारी जन्मभर राबते आहे.

सततच्या व्यसनासाठीच्या पैशाची मागणी आणि पुरवले नाहीत की होणारी मारहाण यांनी कातावून गेलेली इंदू माझ्याकडे आल्यावर सगळं दुःख विसरते आताशा तर रोजचेच रडगाणे गायचे ही तिने सोडून दिलेआहे.

कधीतरी तिचा चेहरा पडलेला दिसला की मी खोदून तिला विचारत असते पण दुःखाचं प्रदर्शन मांडायचं आणि नवऱ्याला नावं ठेवायची हे तिच्या स्वभावात नाही पण अती झाले की कधीतरी ती माझ्यापुढे मोकळी होते.

करोनाचे अस्मानी संकट आले तशी तिच्या जीवनाची घडीच विस्कटली यंत्रमाग बंद पडले. दोन्ही मुलांचं काम गेलं. पैशाची चणचण भासू लागली. माझ्याकडून होता होईल तेवढी मदत करत होतेपण ती खिन्न आहे.

त्यात आणखी तिच्या नवऱ्याची रोजची दारूसाठी पैशाची मागणी

चार दिवस सलग ती आलीच नाही तिच्या मुलाचाही फोन लागेना.एखादा दिवस वाट बघावी आणि मग पाठवावं कुणालातरी तिच्याकडे असा मी विचार करत होते तोवरच दारात उभी !मान खाली घालून काहीशी अस्वस्थच दिसली .घरात आली आणि मटकन खाली बसली. आणि ओक्साबोक्शी रडायला लागली माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली ती दुसऱ्याच कारणासाठी….कुणा मुलाला कोवीड झाला की काय असे वाटले. बऱ्याच वेळानंतर बोलती झाली…

“मालक गेलं वहिनी “…..

“अगोबाई कशानं गं? मला एकदम धक्का बसला.”

“वहिनी जनमभर मी त्याला दारूला कधीबी कमी केलं न्हाई.त्यांच्या व्यसनासाठनं राबलो.तुम्हाला ठाव आहे. घरात दुध नसलं तर चालल पर त्याच्यासाठनं मी कायम पैका दिला. परवा दिवशी त्यांच्या हातात पैसे हुतं पर दारू मिळना म्हनूनशान लै चिडचिड चिडचिड करत हुतं आणि कुठं जाऊन ते हाताला लावत्यात ते काय म्हणतात शनि टायझर पिऊन आलं बघा आनी दवाखान्याला न्यूस तो पतुर डोळ्या देखता गेलं.” असं म्हणून तिने अक्षरशः हंबरडा फोडला.

“म्या त्यांची दारू कवा बंद केली न्हाई. मी त्यांच्या दारू साठनच राबलो का न्हाई वहिनी? मला ठाव असतं दारू कुठं मिळतीया ते तर कुठून बी दारू आनून पाजली असती. त्यांच्यासाठनं काय बी केलं असतं म्या”….. आणि पदर डोळ्याला लावून ती हमसाहमशी रडू लागली

मी आ वासून पाहत बसले त्या सत्यवानाच्या सावीत्रीकडे !!……

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ राष्ट्रीय कर्करोग जागृती दिन विशेष – ‘को-जागर्ति’ ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे 

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ☆ विविधा ☆ राष्ट्रीय कर्करोग जागृती दिन विशेष – ‘को-जागर्ति’ ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

नुकतीच आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी केली. एक आख्यायिका सांगतात की, या दिवशी रात्री लक्ष्मीदेवी ‘को-जागर्ती ‘ म्हणजे ‘कोण जागे आहे ?’ असे विचारते. या दिवशी देवीचा कृपाशीर्वाद मिळतो. समृद्धी येते असे म्हणतात.

हेच कॅन्सरच्या आजाराच्या बाबतीतही म्हणता येईल. को-जागर्ती असे विचारणारी देवी जो “जागृत “आहे त्याला निश्चित प्रसन्न होते आणि त्याला आरोग्य धन मिळते. आरोग्यम् धनसंपदा ! हे तर आपल्याला ठाऊकच आहे.

आज ७ नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागृती दिन (National Cancer Awareness Day ) आहे.  या निमित्ताने तुमच्याशी संवाद साधायची संधी मिळाली आहे.

आज-काल प्रगत तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्रात अनेक आजारांवर सुलभ आणि प्रभावी उपचार करता येऊ लागलेले आहेत. कॅन्सरसारख्या आजाराचा विचार केला की,एक काळ असा होता की ‘कॅन्सर म्हणजे मृत्यू ‘ असेच जणू समीकरण झालेले होते.

पण आज प्रगत, प्रभावी उपचारांनी क्रांती घडविलेली आहे. कॅन्सर रोग पूर्णपणे बरा होणे आजकाल शक्य झाले आहे.  यामध्ये हा आजार सुरुवातीच्या टप्प्यावर लक्षात येणे हा मुद्दा खूप महत्त्वाचा असतो. या आजारावर प्रतिबंधात्मक औषधोपचार नाहीत.  पण,

Early detection is prevention .

असं नक्की म्हणता येईल. म्हणून प्रतिबंधात्मक चाचण्या (प्रिव्हेंटिव्ह चेकअप )खूप महत्वाच्या ठरतात.

महिलांमध्ये कॅन्सर बाबत जागृतीचे काम करताना बऱ्याच वेळा या दुखण्याबद्दलची भीती,तपासणी टाळण्याची वृत्ती, स्वतःच्या स्वास्थ्या बाबतची उदासीनता यांचा अनुभव येतो. हे औदासिन्य,भीती किती ? तर या आजाराची माहिती देणार्‍या व्याख्यानाला येण्याची सुद्धा अनेकांची तयारी नसते .

घरातल्या गृहिणी घरातील इतर सदस्यांच्या तब्येतीच्या छोट्या मोठ्या तक्रारींची लगेच काळजी घेऊन उपचार करून घेतात. पण स्वतः मात्र बारीकसारीक तक्रारी अंगावरच काढतात आणि आजार वाढला की दवाखाना गाठतात. पण काही आजारांच्या बाबतीत बराच उशीर झालेला असू शकतो. शिवाय लाज,संकोच हे जन्मजात स्वभावधर्म साथीला असतातच.

यामुळे कॅन्सर प्रतिबंधात्मक चाचण्यांसाठी सहजासहजी तयार होणाऱ्यांची संख्या तुलनेने खूपच कमी असते. पण वेळेवर सावध होऊन तपासणीला गेलेल्या,आजाराचे अगदी प्राथमिक स्थितीत निदान झाल्याने पूर्ण बऱ्या झालेल्या मैत्रिणी पाहिल्या की खूप समाधान मिळते. पण समजून-उमजून तिकडे दुर्लक्ष करणाऱ्या मैत्रिणी पाहिल्या की वाईट वाटते. हे म्हणजे तोंडावर पांघरूण घेऊन ‘मी झोपलोय’असं म्हणण्यासारखं झालं.

अहो, भाजीची एक जुडी घ्यायची तर आपण ५-६ जुड्या खालीवर करून बघतो. मग आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण किती जागरूक असायला हवे हे लक्षात येतंय ना ? आयुष्यातील प्रत्येक बाबतीत आपण चोखंदळ असतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला चांगलीच हवी असते. आपल्याला अनमोल असे शरीर लाभलेले आहे. मग त्याचे स्वास्थ्य शेवटपर्यंत चांगलेच राहायला हवे ना ! त्यासाठी कोणतेही आजारपण,दुखणे झाले तरी ते वेळेवर लक्षात येऊन त्यावर लगेच उपचार झाले पाहिजेत हे पाहणे हे आपलेच काम आहे.

त्यासाठी दरवर्षी आरोग्यविषयक सर्व तपासण्या करायला हव्यात.  विशेषत: पॅप स्मिअर,मॅमोग्राफी,काही पॅथॉलॉजी तपासण्या करून घेणे खूप आवश्यक आहे. यातून संभाव्य धोक्याची पूर्वसूचनाही वेळेवरच कळू शकते. त्यावरील उपचारांनी आजाराला वेळेवरच रोखता येते. यातून एक लक्षात येते की आज-काल कॅन्सर हा दुर्धर आजार राहिलेला नाही. त्यावर चांगले प्रगत उपचार उपलब्ध झालेले आहेत. प्राथमिक अवस्थेतील कॅन्सर पूर्ण बरा होऊ शकतो. म्हणूनच सर्वांनी जागरूकपणे नियमित कालावधीनी तपासण्या करून घ्यायला हव्यात.

एकूणच कॅन्सर बाबत जागरूक कसे रहावे याबद्दल समजून घेतल्यावर प्रतिबंधात्मक चाचण्यांची उपयुक्तता आणि गरज,सकारात्मक विचारधारा,जीवनातील डोळस वाटचाल यांचे महत्त्व लक्षात आले असेलच. त्यासाठी आपल्या शरीरातील लहान-सहान बदल सुद्धा वेळेवर लक्षात घेतले पाहिजेत.  त्यांची नीट काळजी घ्यायला पाहिजे. घरातल्या अनुवंशिक आजारांची,जवळच्या नातलगांच्या मोठ्या आजारपणाची नोंद ठेवायला हवी. एकूणच नेहमी जागरूक राहायला हवे. कारण शेवटी आपले आरोग्य हे आपल्याच हाती असते. यासाठीच हे कळकळीचे आवाहन—–

 

इकडे जरा द्या तुम्ही ध्यान

कॅन्सर जरी रोग महान

वेळेवर करता त्याचे निदान

मनुजा मिळते जीवनदान !!

 

उत्तम आरोग्याचा आदर्शमंत्र

रोगा आधीच त्यासाठीची तपासणी

आपण सारे मिळून करू या आरोग्य मंत्राची अंमलबजावणी !!

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शेवटची पंगत ☆ डॉ. मंजुषा देशपांडे

☆ विविधा ☆ शेवटची पंगत ☆ डॉ. मंजुषा देशपांडे 

एकत्र कुटुंबांमधल्या कर्त्या बायकांची पंगत म्हणजे शेवटची पंगत.  हिंगणघाटला माझ्या आजोळी आणि विजापूरला परमपूज्य अण्णांच्या घरची… अशा दोन्ही घरच्या शेवटच्या पंक्ती माझ्या सवयीच्या आणि त्या पंक्तींमधले जेवण तर अतिविशेष आवडीचे.

माझ्या लहानपणी आजोळी खूप माणसे असायची.  त्यामुळे पहिली पंगत मुले आणि बाहेर कामासाठी जाणा-या पुरुषांची,  नंतरची लेकुरवाळ्या मुली आणि सुनांची.. आणि सर्वात शेवटी स्वैपाक करणा-या बायकांची म्हणजे आजी, मामी वगैरे लोकांची.  कधी कधी तर या पंक्तीला इतका उशीर होई की पहिल्या पंक्तीत जेवूनही शाळेला सुट्टी असलेली पोरे परत त्या शेवटच्या पंक्तीत परत जेवायला बसत. सणासुदीला तर असे हमखास होई.

या पंक्तीत अनेकदा भाज्यांनी आणि भाताने तळ घातलेला असे.  कधी पोळ्याही पुरेशा नसत. माझी सदा हसतमुख आजी म्हणे… चांगला झाला असणार स्वैपाक…  म्हणून सर्व भरपेट जेवले!  असे म्हणत ती विझू घातलेल्या निखा-यावर तवा ठेवून  पटकन होणा-या भाज्या किंवा पिठलं करी,  त्यात तेल,  तिखट आणि मसाले सढळ हाताने पडे शिवाय त्या शेतातून नुकत्याच आलेल्या त्या ताज्या रसदार भाज्या अर्धवट शिजल्या तरी खूप चवदार लागत.  उरलेल्या वरणावर थोडे तेल,  मीठ,  तिखट आणि मसाला घालूनही एखादे कालवण होई.

पोळ्याच्या परातीत उरलेल्या पीठात थोडे ज्वारीचे पीठ घालून त्यात मिरच्या कोथिंबीर घालून चुरचुरीत खमंग धिरडे करत.  त्याचा वास थेट झोपलेल्या आजोबांच्या नाकात जाई आणि तेही उठून स्वैपाकघरात येत. एकदा जेवल्यावर ते काही पुन्हा जेवत नसत पण मग तिथेच एका पाटावर बसून काहीबाही मजेच्या गोष्टी सांगून सर्वांना हसवत.   आजी ठेवणीतली लोणची काढी.  भाताच्या खरपूडी लोणच्याबरोबर कालवताना पाहून आजोबा हमखास सूर्याच्या थाळीची गोष्ट रंगवून रंगवून सांगत.

त्या पंक्तीत जेवणा-या बायकांसाठी सुबक विडे लावून देत.

दुस-या दिवशी स्वैपाकाच्या अगोदर आजीला बोलावून…थोडे तांदूळ,  डाळ,  कणिक आणि भाज्या जास्तीच्या घ्यायला आवर्जून सांगत.

विजापूरच्या त्या श्रीमंत घरातही मोठ्या बायकांची शेवटची पंगत असे. या पंक्तीला आक्का,  वहिनी,  वाढणा-या मुली,  स्वैपाकाच्या काकू आणि सगळ्या कामाच्या बायका एकत्र बसत. त्या घरी फारसे काही संपलेले नसे पण अन्न गार झालेले असायचे.  कोशिंबिरींनी माना टाकलेल्या असत  तरी मालकीणींपासून ते नोकरवर्गापर्यन्तच्या बायका समाधानाने जेवत.  त्यांच्याकडे या पंक्तीला आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे फ्लाॅवरच्या पानांची चटणी,  ती पण फ्लाॅवरची भाजी केली असली तरच होई. फ्लाॅवरची पाने चिरताना बाजूला काढून ठेवलेली असत. ती बारीक चिरून त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट आणि किंचित मीठ घालत.  त्यावर लिंबू पिळून तांबड्या मिरच्यांची फोडणी देत. सगळ्या बायकांचा तो अगदी आवडता पदार्थ होता.

आज मी एकटीच जेवत होते अचानक या दोन्ही ठिकाणच्या शेवटच्या पंक्ती आठवल्या आणि गलबलल्यासारखे झाले.

अनेक प्रश्नांनी मनात काहूर माजवले वाटले, अन्नपूर्णेच्या हातातल्या त्या ओगराळ्याची दिशा कायम दुस-यांच्या पोटात ताजे घास पडावेत म्हणून… तिच्याकडे ते कधीच का नाही पहिल्यांदा वळत?  सर्वाना गरमागरम खायला घालून स्वतः मात्र  गारढोण अन्न गिळताना… वरवर समाधानाचा आव आणला तरी घशात किती आवंढे दाटत असतील!  भाजी संपली म्हणून लोणच्याबरोबर भात कालवताना…माझ्या वैद्यकी जाणणा-या आजीला स्वतःच्या तब्बेतीची हेळसांड केल्याबद्दल किती वेदना होत असतील…!

अर्थात हे सर्व विचार आत्ता मनात आलेत.  पण हिंगणघाटला असताना त्यांच्या त्या लोणचे भात आणि धिरड्यात वाटा मागताना यातले काही सुध्दा वाटत नसे.

आता विभक्त कुटुंबात सगळे एकत्र जेवत असले तरी शेवटचे.. उरले सुरले संपविण्याचा मक्ता त्या घरातल्या बाईकडेच!  त्यामुळे सर्वांनी हात धुतले तरी ही आपली अजून डायनिंग टेबलावरच बसलेली असते. एकत्र कुटुंबात निदान त्या पंक्तीला इतर बायका तरी असत…आताची शेवटची पंगत तशी सर्वार्थाने तिची एकटीचीच…!

 

©  डॉ. मंजुषा देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ !! मनातलं कागदावर !! ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

☆ विविधा ☆ !! मनातलं कागदावर !! सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

दवांत भिजूनी बहरली

पाने फुले

लागली डोलू लागली हसू

लागली झंकारू

गीत नवे उषेचे..!!

वा..वा..पांघरुणात शिरूर जोजविणारी पहाट…घरासमोरच्या वाटांनी धुक्याची शाल पांघरलीय. ..कोपर्‍यातला सोनचाफा तोही पहाटेच्या थंडीने गारठून गेलाय. फांदयांच्या कुशीतला कळया हळूहळू डोळे टक्क उघडून सभोवार पाहू लागल्यात…हातातलं पेन वहीच्या कागदावर टेकवत मी तोंडासमोर हात धरला आणि वाफांचा एक ढग तोंडातून बाहेर पडला..तेवढ्यात आईने आवाज दिला. ..”अगं, संगीता आत ये,  बाहेर बघं किती गारवा आहे. .!! ” हो, गं आई” मी बसलेल्या खुर्चीतूनच मागे न पाहता बोलली. ..

आधी तू आत ये नाहीतर तुला थंडीनं सर्दी खोकला व्हायचा. आईची ही प्रेमळ सुचना मानून मी वही व पेनाच्या लवाजम्यासहीत  आत आले.आई ” काय मस्त वाटतय ग बाहेर ” बसल्या बसल्या मला कविता पण सुचली. .हो का? ‘बरं बाई ‘, हसून आईने उत्तर दिले. .

मी कवितेचा कागद दप्तरात भरला माझ्या बालमित्राला आकाशला दाखविण्यासाठी. ..आकाशचं घर आमच्या पासून पाच ते दहा मिनीटांच्या अंतरावर. ..आम्ही एकाच शाळेत एकाच वर्गात अगदी शिशू वर्गापासूनच. .एकमेकांच्या खोड्या काढतच आम्ही शाळेत जायचो. .माझा आवडता विषय मराठी. .त्यात कविता, कथा, लघुकथा खूपच आवडायच्या. ..सहावीत वगैरे असेन. .शर्यतीत हरलेल्या सश्यावरची कविता मला आवडली होती. तेव्हापासूनच माझी कवितेशी गट्टी जमली….

“आई गं सांग ना गवतफूल  कसं असत? ” आई, गं सांग ना..!!” माझ्या हाताला धरून माझी छोटीशी लेक अजया मला विचारीत होती. .या प्रश्नाने मी भानावर आले. .मघापासून ती विचारीत होती कवितेविषयी. ..तिच्या पुस्तकात इंदिरा संतांची  “गवतफुला ” ही कविता होती. तिची छोटी छोटी बोटं कवितेच्या शब्दांवर नाचत होती. ..

अजया माझी छोटीशी गोंडस गोड मुलगी. तिला नव्या शब्दांविषयी, वस्तूंविषयी खूप शंका असतात. आणि तिच्या या शंकांचे निरसन करण्यात मला खूप आनंद होतो. तिला तिच्या प्रश्नांचे उत्तर मिळाल्यावर तिचे निरागस हास्य माझ्या मनाला खूपच सुखावते तसेच तिच्या सतत चालणार्‍या चिवचिवाटाने घर आनंदाने भरून जाते. .नंतर नक्की सांग हं आई,  असं सांगून ती खेळायला निघून गेली.

माझे मन भूतकाळाच्या खिडकीपाशी घुटमळू लागले. .आणि आकाशने भेट दिलेले कुसुमाग्रजांचे

“प्रवासीपक्षी ” हे पुस्तक आठवले. ..

नवी दुनिया बसवताना कविता माझ्या पासून कधीच दूर गेली नाही. जशी माझी कवितेशी गट्टी जमली तशीच अजया चीही कवितेशी गट्टी जमली. ..

कविता. .तिची नाळ माझ्याशी घट्ट जोडली होती. .मंद पावलांनी अजया च्या रूपात माझ्या आयुष्यात आली आणि अंगणात आनंदाचे झाड लावले. ..

आनंदाने हुंदका बाहेर पडला आणि कागदावर शब्द उमटले. ..

दौडत जाई काळ

ठेवूनी मागे

क्षणांचे ठसे. .

पात्र. .कण न कण जसे

भरलेले भासे. .!!

एवढ्यात अजया ने हाक मारली ” आई “… या शब्दाने तंद्रीतून जागी झाली आणि कामाला लागली. ..

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print