मराठी साहित्य – विविधा ☆ खेड्यातील भावबंधन ☆ श्री महेशकुमार कोष्टी

☆ विविधा ☆ खेड्यातील भावबंधन ☆ श्री महेशकुमार कोष्टी ☆

आठवणीतला गाव…!

खेड्यातील भावबंधन…!

स्वच्छ, मोकळी हवा, चैतन्य अंगावर माखणारा परिसर, दूरवर पसरलेली हरितक्रांत शेते, पक्षांचा मुक्त संचार आणि आत्मियतेच्या प्रांगणात स्थिरावलेला विशाल डोंगरपायथा आणि या डोंगर पायथ्याशी वसलेलं कौलारू, धाब्याची घरं असलेलं एक टुमदार खेडं…!

सूर्याच्या साक्षीने मंगलमय दिवसाची सुरूवात होते. भल्या पहाटे कडाक्याची बोचरी थंडी घालविण्यासाठी पेटविलेल्या शेकोटीची आल्हाददायक उष्मा देहावर मायेची ऊब पांघरत असते. माय-भगिनी दारापुढे सडा-रांगोळी घालण्यात मश्गुल झालेल्या असतात. गुरा-ढोरांचा हंबरडा वासरांच्या काळजात वात्सल्याचं उधाण आणीत असतो. पहाटेच्या भक्तीरसात डोंगरमाथ्यावरच्या मंदिराच्या घंटा ताल धरू लागतात आणि प्रत्येकाच्या मुखातून हरीनामाचा गजर दुमदुमू लागतो. चुलीवर भाजलेल्या भाकरीच्या घासाने तृप्त होणार्या न्याहरीने दिवसभरातल्या कष्टाला सुरूवात होते आणि खेड्यातलं अनोखं भावबंधन मनामनात घर करू लागते…!

जीवाला जीव देणार्या, एकमेकांशी मायेची नाती जोडणार्या, शेजार्याचं सुख आणि दुःख आपलं मानणार्या माणसांनी हे खेडं एक कुटुंब बनलेलं असतं. व्यक्तिच्या वयाला मान देत दादा, मामा, अण्णा, बापू आणि अगदीच अनोळखी व्यक्तींसाठी ‘राम राम पाव्हणं’ अशी प्रेमळ हाक इथे ऐकू येते, तेव्हा आपणही या कुटुंबाचा अविभाज्य सदस्य बनून जातो. डेरेदार वडाच्या झाडाखाली रंगणार्या पारावरच्या गप्पा भावनिक आणि सामाजिक आदानप्रदानास सहाय्यभूत ठरत असतात. या गप्पांतून प्रत्येकाची सुख-दुःखं वाटून घेतली जातात, तेव्हा सुखाची सावली गडद झाल्याची आणि दुःखाचं आभाळ स्वच्छ, निरभ्र झाल्याची अनुभूती होते. चांदण्यांच्या प्रकाशात बाजल्यावर बसून माय-लेकी, सासू-सुना ‘म्या दिलेली चटणी कशी व्हती?’ ‘कोरड्यास कसं व्हतं?’ अशी आपुलकीनं विचारपूस करतात, तेव्हा त्यांच्या सुगरणतेबरोबरच एकसंघतेचे अतूट बंध अजरामर होत राहतात.

दिवसभरात राबून, कष्ट करून थकलेल्या देहाला विसावा मिळतो तो मंदिराच्या पायरीशी! टाळ, मृदंग, तंबोर्याच्या सुमधुर स्वरांच्या साथीत वातावरण भक्तीमय करणारे अभंग कानावर पडतात, तेव्हा कष्टानं थकलेलं मन नवा जन्म घेत असल्याचा भास होतो.

सण, उत्सव, यात्रा असे कोणतेही लोकोत्सव साजरे करताना पारंपारिक संस्कृतीबरोबरच भावनिक आणि सामाजिक एकात्मतेचं दर्शन इथे घडते.

काळ्या धरणीमातेचं ॠण काळजावर कोरणारी, माणसा-माणसांत जिव्हाळ्याचे बंध पेरणारी, गुरा-ढोरांना जिवापाड प्रेम देणारी, कष्टाला दैवत मानून हात सतत कामात गुंतवणारी आणि लोकसंस्कृतीचा वारसा अखंड चालविणारी ही खेडी मनामनाला जोडणारे सेतू बनून उभी आहेत…!

 

© श्री महेशकुमार कोष्टी

मिरज

शिक्षक व साहित्यिक

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आठवणींचे ऋतू ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी

☆ विविधा ☆ आठवणींचे ऋतू ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆ 

खूप वेळा मनात येत की काही काही आठवणींचे ऋतू असतात. त्या त्या ऋतूत, दिवसात काही आठवणी ताज्या होतात. याचा अर्थ इतर वेळी काही आठवे नसतात अस नव्हे… पण आठवांचे ऋतू काही औरच!

आत आत मनात घर करून बसलेली आठवे कधी कधी खूप उत्साही अन आनंदी करतात…. कधी हेच दिवस पुन्हा यावेत ही मागणीही करतात!

निसर्गाचे जरी तीनच ऋतू असले तरी माझ्या आठवांचे हजारो ऋतू असतात. ‘शब्दांनी’ बहरणारा नी धुंद करणारा माझ्या आठवणीचा…फक्त माझाच….हक्काचा वसंत ऋतू! अस मी म्हणेन…. मला जास्त भावतो. मग तो बाराही महिने असू शकतो. पण…. अस कस होणार!

कुठेतरी चढ उतार असतोच न….

नको असलेले मळभ झटकून टाकणारा, स्वच्छ धूणारा अन परत निरभ्र होणारा.… मनाचा वर्षा ऋतू !

होय! सगळं हलकं हलकं करणारा तन आणि मन चिंब करणारा …. आठवांचे तरंग .. नवतरंग होऊन मिरवणारा! असे अनेक उपऋतु माझ्या आठवणी जाग्या करतात.

कधी मनोमन लाजवतात! रोमांच अंगी उठवतात!

कधी थरारक आठवेही अंग थरथरून टाकतात… हे असे ऋतू मात्र नको वाटतात, पण त्यातून धडे मिळालेले असतात आणि जीवनाला नवी वाटाही … त्यामुळे नको वाटणारे ऋतू खर तर नकळतच एक नवे आव्हान ठरलेला असतो.

एक अवर्णनीय आनंद आणि समाधान देणारा….डोळे बंद केले तरी सगळं हिरवं हिरवं दाखवणारा..मखमल भासवणारा !शांत करणारा…

गुलाबी थंडीतही शब्दांची ऊब माझे ऋतू देतात , शब्दांची चादर अन गोधडी! एक नवं सृजनाचं, सर्जनशील ….सृजन नेहमीच प्रसवत! आणि मन नवे गाणे गाऊ लागत!… हिरव्या ऋतूच…आठवांच्या ऋतूच!

 

© सौ अश्विनी कुलकर्णी

24/8/2020

सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भुलाबाई….. ☆ डॉ. मंजुषा देशपांडे

☆ विविधा ☆ भूलाबाई….. ☆ डॉ. मंजुषा देशपांडे 

भूलाबाई हे पार्वतीचे भिल्ल म्हणजे आदिवासी स्त्री चे रुप.  आपण अनेक कथांमध्ये पार्वतीने शंकरासाठी केलेले तप ऐकले आहे पण इथे शंकराच्या रुपातले भूलोजी राणे पार्वतीचा अनुनय करताना दिसतात. त्यांची  पार्वती राणी रुसून बसते मग ते शंकर तिला स्वतः न्यायला जातात.  तिला झोपण्यासाठी सोन्याचा पलंग आणि मोत्याची मच्छरदाणी असते. तिच्या डोहाळ्यासाठी नाना रंगाच्या भरजरी चोळ्या शिवून त्यावर अत्तरे शिंपलेली असतात.  डोहाळे पुरवण्यासाठी सासू, सासरे, दिर जावा आणि नणंदा धावपळ करत असतात. एवढ्याने काय होणार म्हणून रुसलेल्या पार्वतीकडे शंकर महादेवाची रदबदली करण्यासाठी पहिल्या दिवसांपासून दस्तुर खुद्द खंडोबा, भैरोबा, सूर्य, चंद्र, बृहस्पती असे देव येतात सर्वात शेवटी गणेश आणि कार्तिकेय ही बाळे आल्यावर ती आपला रुसवा एकदाचा सोडते.

हे सगळं त्या भूलाबाईच्या गाण्यातून व्यक्त होते.  या काळात ती शंकरदेवांवर पण यथेच्छ तोंडसुख घेते.. त्याने घडवलेला दागिना कसा धड नाही,  त्याने आणलेले लुगडे कसे पोतेरे, फूले वेचून आणली तीही शिळी आणि बिनवासाची.. त्याला संसाराची कशी आच नाही… सतत डमरू वाजवणे किंवा गणांबरोबर नाचणे आणि तप करणे,  याशिवाय त्याला कसे काहीच येत नाही… अशा प्रकारची वैताग व्यक्त करणारीही काही गाणी आहेत.

शेवटी बिचारा शंकर विष्णू देवांकडून प्रपंचाची कौशल्ये शिकतो तेव्हा कुठे ही भूलाबाई त्याच्याबरोबर जायला तयार होते. भूलाबाई स्वयंप्रज्ञ आहे,  तिला काय हवे ते तिला स्पष्टपणे सांगता येते.  ती अन्याय सहन करत नाही. प्रसंगी वांड नव-याला धडा शिकविण्यासाठी माहेरी किंवा माहेरी भावजया बोलल्या तर सख्यांबरोबर किंवा थोडे दिवस एकटीने फिरून यायचीही तिची तयारी आहे.

मुलींना आत्मसन्मानाची कल्पना यावी आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी निर्भिडपणे वागावे यासाठीच कदाचित पहिली मुलगी असेल त्या घरी प्रामुख्याने भूलाबाई  बसवली जाते.  काही जणांकडे भूलाबाई घटस्थापना ते कोजागिरी पौर्णिमेपर्यन्त बसवतात. तर काही जणांकडे भाद्रपद ते शरद पौर्णिमा अशी महिनाभर भूलाबाई बसलेली असते. भूलाबाई म्हणजे खरे तर ‘शंकर पार्वतीची मूर्ती’ घराच्या दर्शनी भागातल्या कोनाड्यात बसवतात.  या काळात रोज तिला संध्याकाळी हळदी कुंकू आणि अक्षत लावून पूजा करतात.  त्यावेळी  बहुधा त्या दिवसात मिळणाऱ्या किंवा गुलबक्षी, चमेली किंवा जाईच्या फूलांचे बारीक मोरपंखीच्या पानांसकट बनवलेल्या माळा रोज पूजेच्या वेळी घालतात. या माळांमध्ये फूले,  पाने आणि बिया गुंफाव्याच लागतात. गोंड या आदिवासी जमातीत मात्र सगळ्या गावातल्या मुलींची एकच भूलाबाई बसवतात आणि रोज सगळ्याजणी  तिच्यासाठी रानफूलांच्या माळा घेऊन येतात.  त्यांची भूलाबाई म्हणजे मातीची पार्वतीची मूर्ती असते.

भुलाबाईच्या काळात मुली घरोघरी जाऊन टाळ्या वाजवून गाणी म्हणतात. खिरापतही चढती असते म्हणजे पहिल्या दिवशी एक,  दुसर्‍या दिवशी दोन अशा प्रकारच्या..आणि अर्थातच ओळखायच्याही असतात.

शेवटच्या म्हणजे बोळवणाच्या दिवशी मात्र तीस आणि तीन अशा खिरापती करायची पध्दत आहे.  एवढ्या खिरापती एकट्याने करण्याच्या ऐवजी सर्व मुली मिळूनही त्या भुलाबाईची सांगता करतात. जिच्या घरी भूलाबाई बसवतात तिला पांढरे किंवा निळे कपडे घेतात आणि मोत्याचा एखादा दागिनाही करतात.  खिरापतीमध्येही पांढ-या पदार्थांचे  प्राबल्य अधिक असते.

भूलाबाई देवी असली तरी तिला मानवी स्त्री च्या भावभावना आहेत. तिला नव-याचा राग येतो,  माहेरच्या अगदी शेणगोठ्यावरही तिचे प्रेम असते, तिच्या सख्या,  तिची मुले,  भाऊ बहिणी,  आई वडील…सासर माहेर हेच तिचे विश्व… पण त्यातही तिला तिचे स्वतःचे स्थान असले पाहिजे ही जाणीव आहे.. त्यामुळेच भूलाबाई  आपल्याला जवळची वाटते आणि खरं सांगायचं तर ईश्वराचे हे स्त्री- रूप फारच विलोभनीय आहे…

©  डॉ. मंजुषा देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सार्थक ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ विविधा ☆ सार्थक ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर 

‘अगं आई, बास कर आता… काय बारीकबारीक पाकळ्या वेचतीहेस… चांगली फुलं पण निघालीत भरपूर.. दे आता पिशवी.. बाकी कचरा टाकून देते’ असं माझं जरा वैतागलं वाक्य! मागं एकदा आई माझ्याकडं आली असताना फुलांच्या छोट्या पिशवीतून देवपूजेसाठी फुलं काढत होती. बरीच फुलं पारच बावली आहेत असं लक्षात आल्यावर म्हटलं, ‘संध्याकाळी नवी फुलं आणूया. आज आता चांगली सगळी घेऊन टाक पुजेला आणि खराब झालेली टाकून देते. फार कुजली तर वास येत राहातो फ्रिजमधेही!’ ‘हो, तसंच करते’ म्हणत ती फुलं निवडू लागली. मी माझ्या उद्योगातून मधेच स्वयंपाकघरातून बाहेर आले तरी ही अजून अगदी शेवंतीच्या फुलांच्या गळलेल्या अतीबारीक पाकळ्यांतूनही चांगल्या पाकळ्या निवडतच होती. मुळात चार-सहा देव आणि चार-सहा फोटो इतकंच काय ते देवघर! बाजूला निघालेल्या चांगल्या फुलांचा बऱ्यापैकी ढीगच देवांच्या मानानं खूप होता आणि आई उगीच जीव का शिणवतेय ह्या विचारानं मी वैतागून तिला ‘बास कर’ म्हटलं. त्यावर ती मानही वरती न करता शांतपणे पाकळ्या निवडत स्निग्धपणे म्हणाली, ‘त्यांचा पण जन्म वाया जाऊ नये गं! अगदी बावलेलं काही वाहाता येणार नाही देवाला, पण ज्या पाकळ्या अजून जरा टवटवीत आहेत त्या तरी वाहाते.’ ‘जाऊदे, आपल्याला कुठं काय तोशीस आहे, करुदे काहीतरी’ असं मनाशी म्हणत मी परत स्वयंपाकघराकडं वळले… मात्र नंतर कधीतरी असे आपल्याही नकळत रुजलेले क्षण तरारून उगवून येतात अचानक!

तसंही काही गोष्टी ह्या आपल्याकडं अपरिहार्य असतातच… अगदी रट्टे देऊन गळी उतरवलेल्या! पान इतकं स्वच्छ असलं पाहिजे कि माणूस त्यात जेवलं आहे कि नाही कळू नये, भांडी घासायला टाकताना ती स्वच्छ निपटलीच पाहिजेच… अन्नाशी मस्ती करायची नाही म्हणजे पर्यायाने अन्नाच्या एकेका कणाचा जन्म सार्थकी लागला पाहिजे. साडी जुनी झाली कि पूर्वी त्याची गोधडी व्हायची, फाटलेल्या कपड्यांच्या पिशव्या व्हायच्या… धाग्याचा जन्म पूर्णपणे सार्थकी लागायचा.  वहीतल्या उरलेल्या कोऱ्या कागदांची दाभण-दोऱ्यानं विणून वरती छान कोरा कागद चिकटवून त्यावर नक्षी रेखून दिमाखदार होममेड वही व्हायची. त्यातही कोरे कागद प्रत्येकी चार भागांत कापून गृहपाठ उतरवून घ्यायला केलेली पिटुकली वही तर काळजाच्या फारफार जवळची असायची. आज पाच ते पंचवीस ते शंभर रुपयांपर्यंत किमान दर्जापासून बऱ्या, मध्यम ते उत्तम दर्जापर्यंत वह्या सहजी बाजारात मिळतात… पण मला त्या भावत नाहीत. कागदाचा पर्यायानं वृक्षराजाच्या काळजाचा एकेक कण सार्थकी लावताना त्याचे जे नकळत आशीष लाभायचे ते ह्या वह्यांमध्ये कुठून यायचे आणि त्याशिवाय आपलं काळीज त्याच्याशी कसं जोडलं जायचं!?

गतिमानतेची अपरिहार्यता, त्यातून बंद झालेली मनाची कवाडं, अती बरकतीसोबत येणारा अहंकार, कोडगेपणा आणि कोरडेपणा, काळजाची गुंतवणूक हरवलेली स्पंदनं.. ह्या सगळ्यातून जुन्या सोन्यांतलं झळाळलेपण मागं पडत गेलं, आपणं अंतर कोरडंठक्क झालंय, स्वत: किती दर्जेदार जगतोय असा विचारही मनात येत नाही तर हळवे धागे गुंफत दुसऱ्याचा जन्म सार्थकी लावण्याचा विचार फारच दूर! त्यातून भाळी येणारं नैराश्य, वैफल्य, एकाकीपणही आपण सोसत होतो्च… मात्र वेगानं फिरणाऱ्या जगण्याच्या ‘मेरी गो राऊंड’ला थोपवायचं कसं हाही प्रश्न होताच. काही ओढवून घेतलेली आणि काही काळानुरूप स्वीकारावी लागलेली अपरिहार्यता कळसावर पोहोचून खदाखदा हसून आपला अंत पाहात होती आणि एका क्षणी अनपेक्षितपणे हे ‘मेरी गो राऊंड’ थांबलं… थोड्याश्या भयशंकांमधेही जगणं किंचित स्वस्थावलं आणि काही अवधीनं जेव्हां चक्र उलट दिशेनं फिरू लागलं तेव्हां अंतरी नकळत रुजलेल्या जाणिवांना पालवी फुटू लागली. स्वस्थावलेपण विरत जात कुठंतरी क्षणांचा जन्म सार्थकी लागतोय असं मनात आलं आणि आईच्या वाक्याची आठवण झाली.

ज्या मृगजळामागे वेड्यासारखे धावत होतो ते अख्खं मृगजळ अचानक लुप्त झालं, धावणं थांबलं तरी जगणं थांबलं नाही, उलट ते मोहरू लागलं… जन्म सार्थकी लागल्या क्षणांचे भरभरून आशीर्वाद मिळूनच कदाचित तृप्तावलं, शांतावलं, सुखावलं. पुरवूनपुरवून वापरताना अन्नाच्या एकेका कणाला जपलं जाऊ लागलंय, घरट्याच्या कानाकोपऱ्याला गोंजारलं जाऊ लागलंय, बेदरकारपणे टाकाऊ म्हणून फेकल्या जाणाऱ्या गोष्टींतलं सौंदर्य टिपायला नजर सरावतेय आणि त्यातून सृजनाचे रंग उधळले जाताहेत, माळ्यावरच्या अडगळीतली अनमोल हिरे-माणकं खाली येत त्यांना पैलू पाडून कोंदणात सजवण्याचा नाद लागला आहे, देवघरातली बेगडी माळ दूर सारली जात सांजवात उजळू लागलीये, शुभंकरोतीच्या सुरांनी तिन्हीसांज सजू लागलीये. दूरस्थ नात्यांशी संवाद घडू लागलेत… सर्वांना सुखी ठेव म्हणताना त्यांच्यासाठी आठवणीनं हात जोडले जाऊ लागलेत. सोय असूनसुद्धा आता व्हिडिओ कॉल नको वाटू लागलाय, लवकरात लवकर एकदा ग्रहण सुटून जिवाशिवाच्या भेटीचीच जीव वाट पाहू लागलाय. बहुधा काळजचं रितेपण, संवेदनांचं शुष्कपण जाऊन घराचं घरपण, जगण्यातलं जिवंतपण परत येऊ लागलंय!

खरंतर हे सगळंसगळं अस्तित्वात होतंच.. मात्र त्याचं अस्तित्व जाणवून घ्यायला ना आपल्याकडे वेळ होता, ना मनाच्या बंद कवाडांना त्याची चाहूलही लागत होती. सुरेश भटसाहेबांच्या, उरले उरांत काही आभास चांदण्याचे आकाश तारकांचे उचलून रात्र गेली…. ह्या ओळींप्रमाणं आज आपण जेव्हां रिते झालो आहोत…. त्यावेळी मनाच्या कप्प्यात खोलवर रुजलेल्या ह्या गोष्टी आपल्यासाठी चांदण्यांचे आभास होऊन सामोऱ्या आल्यात. आज त्यातल्या तारकांची आभा आपल्याला जाणवायला लागली आहे. आता हे जपायला हवं असं कुठंतरी आत जाणवू लागलं तशी मी प्रहार ह्या अप्रतिम हिंदी सिनेमातल्या मंगेश कुलकर्णींच्या अप्रतिमच शब्दांशी पोहोचले…

हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा, जब भी खुलेगी चमकेगा तारा

कभी ना ढले जो, वो ही सितारा, दिशा जिससे पहचाने संसार सारा

वाटलं, हाती येऊ लागलेलं आकाश आता मुठीत घट्ट पकडून ठेवायला हवं. त्यातल्या आपल्याच जिवाला लुभावणाऱ्या चांदण्या, तारका, नक्षत्रही हातून निसटता कामा नये. नैराश्याचा झाकोळ दूर करणारी ही रत्नमाला जपायला हवी. त्यातून संवेदना जिवंत होताहोता जगण्याला भान येईल… जे आजूबाजूलाही संवेदनशील डोळसपणे पाहायला शिकवेल… ज्यातून ज्ञानोबारायांच्या,

हे विश्वची माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर ।

किंबहुना चराचर । आपणची जाहला ॥…. ह्या शब्दरत्नांच्या तेजार्थाचीही कदाचित अनुभूती मिळेल.

 

©  सुश्री आसावरी केळकर-वाईकर

चेन्नई

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ।।श्री।। नवरात्र…..☆ प्रा. सौ. सुमती पवार

प्रा.सौ. सुमती पवार

☆ विविधा ☆ ।।श्री।। नवरात्र….. ☆ प्रा. सौ. सुमती पवार’☆

चला मंडळी मी तुम्हाला आता माझ्या माहेरीच घेऊन जाते, नवरात्राच्या … पुजे साठी…! हो पण मी आता ९/१० वर्षांची मुलगी आहे बरं का .. तुम्ही ही थोडे लहान व्हाच माझ्या बरोबर ..म्हणजे कशी मजा येईल नाही का..?

तेंव्हा फारसे कळत नव्हते याचे आता वाईट वाटते .. आई राबायची . काही काम सांगायची नाही. दसरा यायच्या आधी १५ दिवस तिची लगबग सुरू व्हायची.

आता ते लहानपणी पाहिलेले सारे.. डोळ्यांसमोर लख्ख दिसते मला . हो .. खेड्यातले घर .. मातीच्या भिंती, चूल नवरात्र सुरू होतांना घट बसवायच्या आधी सारी साफसफाई झाली पाहिजे . रोजच्या कामांचा धबडगा त्यात घराला पोतेरे करणे, चुनखडीची पांढरी माती आणवून पूर्ण घर ती लख्ख करायची, सर्व घर शेणाने सारवून घ्यायची, नि मग बाकीची तयारी सुरू व्हायची .

गहू ओले करणे. हो सांजोऱ्या पुऱ्यांचा नैवेद्य लागतो ना ? मग गहू ओलणे, ते बांधून ठेवणे ते स्वत: जात्यावर दळणे, त्याची रवा पिठी वेगळी करणे … ही…..कामांची झुंबड  उडायची विचारू नका .. म्हणून आता आठवले की, डोळे भरून येतात .. काहीच का उपयोगी पडलो नाही आपण आईच्या ? का तिने कामाला लावले नाही मला …? ह्या आया  असतातच अशा …स्वःताच झिजतात …

मग दारावर कुंभारीण डोक्यावर मडक्यांचा मोठा हारा घेऊन यायची  . हो तेव्हा गावचे १२ बलुतेदार गावची  सेवा करायचे नि दाम रोख न मागता सुगीत खळ्यावर येऊन धान्याच्या रूपात मोबदला न्यायचे . कुंभारीण दारात ऐसपैस बसायची नि आई तिच्या पसंतीची मडकी निवडून घ्यायची घटा साठी ! एक मोठे व दोन छोटी .. त्याला लोटा म्हणायचे आमच्याकडे खानदेशात .. तरी आई तिला भाजी भाकरी, गहू बाजरी द्यायची . कुंभारीण खूष होऊन जायची . मी तिथेच आई जवळ 11लुडबुड करत असायची . मग आई त्या कोऱ्या मडक्याला धुण्यासाठी त्यात पाणी ओतायची नि मस्त खरपूस वास सुटून हलकीशी वाफ त्यातून निघत सुर सुर असा आवाज येत ते मडके पाणी शोषून घ्यायचे कारण ते भट्टीतून भाजून काढलेले असायचे ना ?

मग प्रथमेला एका विशिष्ट जागी जिथे फारशी वर्दळ नाही अशा खोलीत देव्हारा लख्ख करून त्याच्या समोर जमिनीवर गहू बाजरी गोल अंथरून पाण्याने भरलेला घट त्याच्यावर बसे व त्याच्यावर तो छोटा घट -ठेवला जाऊन दोन्ही घटांना फुलमाळा लटकत .

अहो त्या काळी ६० वर्षांपूर्वी फुले कसली खेड्यात …? तर शेतात असणाऱ्या रुई च्या झाडांची फुले सालदार गडी शेतातून येतांना घेऊन यायचा नि त्यांची माळ बनायची ..ती माळ दोरीने वर पर्यंत टांगलेली असायची . आणि हो .. एक मोठा पावशेर तेल मावेल असा दगडाचा खोल दिवा ती घासून पुसून ठेवायची निमोऽऽऽऽठी वात करून त्यात भरपूर तेल ओतून पेटवायची ..किती प्रसन्न नि छान वातावरण निर्माण व्हायचे ! घरोघर घट बसायचे . त्याच चर्चा व्हायच्या .. आई रात्री १० दिवस घटा जवळच गोधडी टाकून झोपायची .. हो, दिवा १० दिवस अखंड तेवत ठेवायचा ना … ! म्हणून रात्रीतून चार वेळा उठायची .. वात सारखी करायला … हे सारे आठवले म्हणजे त्यांच्या निष्ठेचे कौतुक वाटते.

१० व्या दिवशी काय मज्जा ! किती पदार्थ बनवायची .. आताही मला जाळीदार स्टॅण्डला तो टांगलेला फराळ दिसतो आहे .. टम्म सांजोऱ्या . गरगरीत पुऱ्या .. अहा बघूनच मन तृप्त होत असे .. मी तेव्हा किती काय खाल्ले आठवत नाही पण तो टांगलेला फराळ कायमचा स्मृतीत दडलेला आहे …. तो नजरे समोरून हटत नाही ..देव्हाऱ्याजवळ मुटकुळ करून झोपलेली आई दिसते … आणि हो या दहा दिवसात घटा खालच्या गहू बाजरीला भरगच्च हिरवेगार धान जवळपास ९/१० इंचापर्यंत वाढून सुंदर दिसायचे …! रोज फुलमाळा बदलल्या जायच्या… पवित्र नि मंगल वातावरणाने घर भरून जायचे …!

आता मी नवरात्रीचा विचार करता … असे वाटते की …काळानुसार स्वरूप बदलले आहे ..  उत्साह मात्र प्रचंड आहे ..घराघरातूनअंगणातून गर्बा आता खुल्या मैदानात आला आहे.. तरूणाई थिरकते आहे, आनंद लुटते आहे . अबालवृद्ध मोठ्या चवीने गरबा बघतात आनंद लुटतात .. रस्तो रस्ती चैतन्य सळसळतांना दिसते ..नवरात्र ते दिवाळी आनंदाला नुसते उधाण येते ..

नवरात्रात घरोघरी बसलेल्या घटा खाली उमललेले हिरवे धान हे…. हे देवीच्या  ……. सृजनशीलतेचे प्रतिक आहे ..घरोघर तिची पूजा अर्चा होते, गणेश चतुर्थी पासून सुरू झालेल्या सणांची दिवाळी नंतर सांगता होऊन  हे उत्साहाचे पर्व समाप्त होते … ते हिवाळ्याच्या दुलईत गुडूप होऊन शांत होते…

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

दि . २३/०९/२०२० वेळ : रात्री ११:२५

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भोंडल्याची सोळा गाणी ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ भोंडल्याची सोळा गाणी ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

‘सूर नवा ध्यास नवा ‘ या कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी किमान दोन वर्षापूर्वी प्रश्ण विचारला होता पण त्यानिमित्याने सुरु झालेला  ‘भोंडल्याची१६ गाणी’ चा प्रवास अजूनही सुरु आहे आणि मुख्य म्हणजे तो खूप सुखावह आहे. अनेक जण बालपणीच्या आठवणीत दुनियेत रमत आहेत

तर जरा यात बदल म्हणून

‘दिवस नवा, टवाळखोरी पून्हा ‘ या आमच्याच एकतर्फी कार्यक्रमात ही ‘अमल्याची काही गाणी’ ?

(टीप : मनोरंजन हा हेतू)

 

करोना करोना, इथे तिथे देवा

ऑनलाईन खेळूनच, यंदा तुझी सेवा

झूम आयडी ठरला  दुपारच्या पारी,

पासवर्ड धाडला व्हाटसपवरी

मेसेज वाचल्याचा पाहिला टिक्का

आमच्या ग्रुपच्या हुश्शार बायका

♥ ♥ ♥ ♥ ♥ 

एक मास्क घेऊ बाई, दोन मास्क घेऊ

दोन मास्क घेऊ बाई तीन मास्क घेऊ

रंगीत मास्क घेऊ बाई,डिझाईन पाहू

आठवड्या भराचा साठा

भारी फोटो स्टेटसला टाका

♥ ♥ ♥ ♥ ♥ 

अक्कल बातमी, बक्कळ बातमी,रिपोर्ट तो खणावा

अस्सा रिपोर्ट सुरेख बाई,ट्विट ते रोवावं

अस्सं ट्विट सुरेख बाई, चर्चा ती करावी

अश्शी चर्चा सुरेख बाई, चॅनेल ते बघावं

अस्सं चॅनेल सुरेख बाई, पैशाचं जमावं

♥ ♥ ♥ ♥ ♥ 

दिल्लीत जाऊ, मुंबईत जाऊ तिथेच होता बत्ता

लोकशाहीला लेक झाला, नाव ठेवा सत्ता

 

दिल्लीत जाऊ, मुंबईत जाऊ तिथेच होती भाकर

भक्त असो वा चमचे सगळेच आपले चाकर

 

दिल्लीत जाऊ, मुंबईत जाऊ तिथेच होता पाटा

पाच वर्षात निवडणूक आली, आश्वासनं परत वाटा

♥ ♥ ♥ ♥ ♥ 

‘कार्डशेडचा’  वेल लाव गं सुने, लाव गं सुने

मग जा आपुल्या माहेरा माहेरा

कार्डशेडचा’  वेल लावला हो सासुबाई लावला हो सासुबाई

आता तरी जाऊ का माहेरा माहेरा

 

‘काढ्याचा’  डोस वाढू दे गं सुने, वाढू दे गं सुने

मग जा तू  आपुल्या माहेरा माहेरा

‘काढ्याचा’  डोस वाढला हो सासुबाई वाढला हो सासुबाई

आता तरी जाऊ का माहेरा माहेरा

 

‘पार्ल्याचे’ बिस्कीट खा गं सुने, खा गं सुने

मग जा तू  आपुल्या माहेरा माहेरा

‘पार्ल्याचे बिस्कीट’ खाल्ले हो सासुबाई खाल्ले  हो सासुबाई

आता तरी जाऊ का माहेरा माहेरा

 

‘आरेची’ दृष्टं काढ ग सुने, काढ ग सुने

मग जा तू आपल्या माहेरा माहेरा

‘आरेची दृष्ट काढली हो सासुबाई काढली हो सासुबाई

आता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा

आणा जेसीबी,वापरा जेसीबी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा

♥ ♥ ♥ ♥ ♥ 

वाच बाई वाचुनी

वाचुन पुढे ढकलुनी

‘टवाळखोर’ नशीब दमला

टुकार भोंडला  संपला ?

 

टीप:  निवडक गाणी ☝️

 

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

मैफिल ग्रुप सदस्य

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पु. ल.देशपांडे ☆ डाॅ.मेधा फणसळकर

डॉ. मेधा फणसळकर

☆ विविधा ☆  पु. ल.देशपांडे ☆ डाॅ. मेधा फणसळकर ☆

स्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (पु. ल. देशपांडे)

“क्रियापदाचे मोठेपण त्याच्या कर्त्याने केलेले कर्म किती मोठे आहे त्याच्यावर अवलंबून असते.”

हे वाक्य ज्या कर्तृत्ववान कर्त्याने उच्चारले त्याचे स्वतःचेच कर्तृत्व इतके महान आहे की अवघ्या काही मिनिटात त्याच्यातील व्यक्तीचीच काय पण वल्लीचाही परिचय करुन देणे म्हणजे ‛नस्ती उठाठेव’ करण्यासारखे आहे.

पु. ल., पी.एल्. किंवा भाई या संबोधनाने जी व्यक्ती ओळखली जाते ती म्हणजे महाराष्ट्राचे कोट्याधीश ‛पु. ल. देशपांडे.’! त्यांची जन्मशताब्दी या वर्षात आपण साजरी करत आहोत.

कोट्याधीश या उपाधीबद्दल एकदा पुलना विचारले असता ते म्हणाले,“विनोद हा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. माझ्या बाबतीत म्हणाल तर मला अत्यंत गंभीर प्रसंगी देखील नेमकी एखादी विसंगती दिसते आणि विनोदनिर्मिती होते.” याच विसंगतीतून त्यांनी विनोदी लेखन, नाटके, चित्रपटांसाठी पटकथा – संवादलेखन अशा विविध साहित्यप्रकारांची ‛पुरचुंडी’ आपल्या गाठीशी बांधली.

अंमलदार, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, ती फुलराणी, विठ्ठल तो आला आला सारखी नाटके, अपूर्वाई-पूर्वरंग सारखी प्रवासवर्णने, असा मी असामी, बटाट्याची चाळ, हासवणूक, मराठी वाङ्मयाचा ( गाळीव) इतिहास अशी ‛अघळपघळ’ लेखननिर्मिती केली.

१९५६-५७ या कालखंडात त्यांनी नभोवाणी- आकाशवाणीसाठीसुद्धा काम केले. १९७२ मध्ये दूरदर्शनमध्ये नोकरी केली.

आता ‛उरलंसुरलं’ क्षेत्र म्हणजे संगीत! त्याची तर भाईंना आधीच उत्तम जाण आणि ज्ञान असल्याने संगीतकार म्हणूनही त्यांनी अनेक चित्रपटगीतांना संगीत दिले . ‛देवबाप्पा’ चित्रपटातील ‘ नाच रे मोरा’ हे गाणे आजही अनेकांच्या बालपणातील स्मृती चाळवते. ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटाचे तर भाई सबकुछ होते.कथा-पटकथा-संवाद-संगीत आणि अभिनयसुद्धा!

आयुष्यातील विसंगतीची ‛खिल्ली’ उडवतानाच समाजातील विसंगती नष्ट करण्याचा त्यांनी अंशतः प्रयत्न केला.सक्रिय शक्य नसले तरी अनिल अवचट यांच्या ‛ मुक्तांगण’ व वेश्यांच्या मुलांचे पुनर्वसन करणाऱ्या ‛निहार’ या संस्थेला भरभरुन आर्थिक सहकार्य दिले. हे ‛गणगोत’ मात्र त्यांनी काळजापासून जपले. म्हणूनच मैत्रीची व्याख्या करताना ते म्हणतात-

“ रोज आठवण यावी असं काही नाही

रोज भेट व्हावी असंही काही नाही

पण मी तुला विसरणार नाही

ही झाली खात्री

आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री

शेवटी काय हो,

भेटी झाल्या नाहीत तरी

गाठी बसणं महत्वाचं !”

हीच गाठ भाई तुम्ही आम्हा रसिकजनांच्या हृदयात इतकी घट्ट मारली आहेत की ‛ काय वाट्टेल ते होईल’ पण ‘पु.ल.- एक साठवण’ ची आठवण पिढ्यान् पिढ्या कायम राहील.

 

©  डाॅ. मेधा फणसळकर

9423019961

≈  ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आरसा……  ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ आरसा…… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

आरसा! प्रत्येक गोष्टीचे प्रतिबिंब दाखवणारा आरसा 6000 वर्षापूर्वी इजिप्शियन लोक polished copper आरसा म्हणून वापरत होते .साधारणपणे एकोणिसाव्या शतकात आपण वापरतो तो आरसा अस्तित्वात आला

प्राचीन काळातील शिल्प पहाताना, अजंठा वेरूळ येथील मूर्ती पाहाताना मनात प्रश्न पडे की तेव्हा आरसा कुठे होता पण त्यासंबंधी वाचन केल्यावर असे लक्षात आले की तेव्हा आरसा म्हणून सोने ,चांदी किंवा तांबे अशा धातूंचे चकचकीत सपा ट पृषठभाग आरसा म्हणून वापरले जात असत!

पौराणिक गोष्टींमध्ये पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाला आरसा म्हणून वापरले जाई. पंचतंत्राच्या गोष्टीत पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाला दुसरा सिंह समजून डरकाळ्या मारणारा सिंह आपण पाहिला !थोडक्यात काय आपलं तोंड पहाणे म्हणजे आरशात तोंड बघणे होते.

‘डोळ्यात वाच माझ्या तू गीत भाव ना चे…. ‘हे गाणे ऐकताना असे हे प्रतिबिंब आपण दुसऱ्याच्या डोळ्यात पाहतो. दुसऱ्याला एखाद्या गोष्टीविषयी काय वाटतं ते त्याच्या चेहऱ्यावरून व डोळ्यावरून ही कळते .चेहरा हा मनाचा आरसा आहे म्हणतो ते यासाठीच! एखादी व्यक्ती आवडत नसते तरी समोर आल्यावर हसरा चेहरा ठेवून आपण तिचे स्वागत करतो, मनातलं चेहऱ्यावर उ म टू देत नाही. अशावेळी आरशामागे ज्याप्रमाणे मुलामा लावलेला असतो त्याप्रमाणे आपण मनाला आतून बंद करून घेतो आणि  समोरून दिसणारा भाग मात्र आरशाप्रमाणे  चकचकीत दिसतो.

आरसा वरून मला चितोडची राणी पद्मिनी ची गोष्ट आठवली. तिची अभिलाषा धरणाऱ्या

अल्लाउद्दीन खिलजी ला राणा प्रतापने पद्मिनी चे आरशातील प्रतिबिंब दाखवून बरोबर उत्तर दिले .आरशात जर ती इत की सुंदर  दिसते तर प्रत्यक्षात ती किती सुंदर असेल या कल्पनेने खिल् जी भारावून गेला आणि चितोड वर स्वारी केली पण सौंदर्याबरोबरच स्वाभिमान असणाऱ्या पद्मिनी ने जोहार करून आपले सौंदर्य अजरामर केले!

आपण वापरतो तो आरसा आपल्या देशात साधारणपणे एकोणिसाव्या शतकात आला आणि स्त्रियांच्या सौंदर्य प्रसाधनात आरशाची भर पडली. त्याकाळी स्त्रियांकडे एक आरसा पेटी असे. खोपा आंबाडा घालताना केस विंचरणे ,भांग पाडणे हे खाली बसून आरशात बघून केले जाई. माझ्या आजीची अशी फणी क रंड्या ची  लाकडी पेटी होती त्या पेटीवर छान नक्षी होती. पेटी उघडली की समोर आरसा आणि पेटीत काजळ कुंकवाचा करंडा आणि फणी ठेवण्यासाठी छान मखमली जागा होती. तिच्याकडे एक हस्तिदंती फणी पण होती. या सर्व गोष्टींची मला गंमत वाटत असे .आजी वेणी घालताना मी तिच्यासमोर बसून सर्व निरीक्षण करीत असे.

पुढे गोदरेज ची किंवा मोठा आरसा असणारी लोखंडी कपाटे बाजारात आली आणि लोक अशी कपाटे  खरेदी करू लागले. पाच वारी साडी बरोबरच संपूर्ण साजशृंगार त्यात बघता येई.

असा हा आरसा जीवनात महत्वाची जागा व्यापू लागला. इतका की ऑफिसला जाताना छोट्याशा पावडरच्या डबीतही हा आरसा सामावला गेला!

आरशाचे विविध प्रकार आपल्याला म्युझियम मध्ये बघायला मिळतात. एखाद्या आरशात आपण जाड बुटके दिसतो तर एखाद्या आरशात अा पन एकदम बारीक आणि उंच दि स तो. एखादा आरसा आपल्या प्रत्येक हास्या गणिक  वेगवेगळे रूप दाखवतो की ते बघूनच आपल्याला हसू येते

पूर्वी बेल्जियम काचेचे आरसे प्रसिद्ध होते .त्याची काचही चांगली असे आणि त्यावर बाजूने नक्षीकाम ही केलेले असे. मोठे मोठे आरसे लावून राजे महाराजांचे दिवाणखाने ही सजत असत. काही सिनेमातूनही अशा

आरशांचा उपयोग केला गेला. प्यार किया तो डरना क्या? गाण्याच्या नृत्यावर असंख्य चेहरे प्रतिबिंबित होणारा मोठा सेट तेव्हा उभारला गेला होता.

आरशासारखे स्वच्छ निर्मळ मन असावे किंवा एखाद्याचा स्वभाव आरशासारखा निर्मळ आहे असे म्हंटले जाते . अशा सुभाषितवजा वाक्यातून ही आरशा बद्दलची संकल्पना साकार होते. मनात असलेले वाईट विचार ,द्वेष ,रा ग यांची मनाचा आरशावर आलेली  काजळी प्रयत्नपूर्वक पुसावी लागते. मूल लहान असते तेव्हा त्याचे हास्य  आरशासारखे स्वच्छ व निर्मळ असते. तो मनाचा आरसा नितळ असतो ,त्यावर चरे ओरखडे उमटलेले नसतात. जसजसे मोठे होत जाते तसे त्याचे बालपण जाऊन विकार वाढू लागतात आणि मनाच्या आरशाची स्वच्छ प्रतिमा धुरकट होत जाते ही क्रिया नकळत घडत असते!एकदा का आरशाला तडा गेला की कितीही सांधले तरी तो तडा पूर्ण नाही सा होत नाही !

त्याप्रमाणेच हा मनाचा आरसा जपावा लागतो. तडा जाऊ न देता स्वच्छ प्रतिमेसह!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ≈  ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चूल…. ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

 ☆ विविधा ☆ चूल….. ☆ श्रीमती अनुराधा फाटक  ☆ 

जिच्यामध्ये अग्नी प्रज्वलित केला जातो ती जागा म्हणजे चूल.चूल ही सामान्यतः स्वयंपाकघरात असते.तिच्यावर कुटुंबाचा स्वयंपाक केला जातो म्हणून चुलीला देवत्व प्राप्त झाले आहे त्यासाठीच चुलीला पाय लावीत नाहीत.पूर्वी चूल सारवून तिच्यावर रांगोळी घातली जात असे.अग्नीकुंडाचे एक स्वरुप म्हणून चूल ओळखली जाते.

चूल हा मानवाच्या सांस्कृतिक विकासाचा महत्वाचा टप्पा दाखवते.प्रारंभी माणसे विस्तवात अन्न भाजून खात असत.त्यानंतर तीन दगडांची चूल आली.बलुतेदारीची पध्दत अस्तित्वात आल्यावर कुंभार मातीच्या चुली बनवू लागले.नंतर लोखंडाची,लोखंडी बादलीतील चूल आली.फिरस्तीचे लोक हलविता येणारी ती चूल वापरू लागले.आता गॅसच्या शेगड्या सर्वत् वापरात असून विद्युत चूल आणि त्या पाठोपाठ सौर चूल आली.

कितीही गरीबी असली तरी चूल अडवता येत नाही .काही ना काही शिजवावेच लागते.कधी कधी मात्र चुलीला वाटाण्याच्या अक्षदाही द्याव्या लागतात

म्हणजे उपाशी रहावे लागते.याला चुलीला विरजण पडणे असेही म्हणतात.अत्यंत दारिद्र्यावस्था येण्याला चुलीत मांजरे व्यालेली अवस्थाही म्हटले जाते.दारिद्र्यात भर पडणे म्हणजे चूलजाळ आणि पोटजाळ एक होणे !

काही वेळा माणसाची बुध्दी नको ते काम करते त्यामुळे नुकसान होते अशावेळी तुझी अक्कल चुलीत गेली होती कां?असे विचारले जाते.

चूल आणि स्त्री यांचे नाते अतूट असल्याने बऱ्याचवेळा स्त्रिया आपले विचार चुलीत सारतात म्हणजे गप्प बसतात, चुलीत डोके खुपसून स्वयंपाक करतात.

आता मात्र स्त्री बाहेर पडल्याने चुलीत डोके खुपसण्याइतकेच तिचे जगणे मर्यादित राहिले नाही.

जोपर्यंत मानवी जीवन आहे तोपर्यंत चूलीचे अस्तित्व असणार आहे.

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 68 – जननी – जनक ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 68 ☆

☆ जननी – जनक ☆

माझ्या आईचा मी विचार करते तेव्हा मला खुपच चकीत व्हायला होतं, त्याकाळात सगळ्याच बायका गृहकृत्यदक्ष वगैरे असायच्या, माझी आई सुशिक्षित कुटुंबातली तिची आई सामाजिक कार्यकर्ती, वडील कोऑपरेटिव्ह बँकेचे मॅनेजर होते, निवृत्त झाल्या वर शेती करत होते ते कोकणातले आमराई ,भातशेती वगैरे ! खुप मोठा बंगला, आईचं लग्न घाटावरच्या भरपूर शेतीवाडी असलेल्या घरात झालेलं! पण ती आम्हा सख्या चुलत सहा भावंडांना घेऊन शहरात बि-हाड करून आमच्या  शिक्षणासाठी राहिली. आजोबा त्या काळात त्या भागातले मोठे बागाईतदार, त्यामुळे आईच्या हाताखाली कायम दोन तीन बायका असायच्या पण स्वयंपाक मात्र ती स्वतः करायची ! तिनं आम्हा बहिणींना कधीच घरातली कामं करायला लावली नाहीत, ती भरतकाम, विणकाम, खुपच सुंदर करायची, हौस म्हणून मशीनवर कपडे शिवायची, सुंदर  स्वेटर विणायची! स्वयंपाकात सुगरण होती, या कुठल्याच कला तिने मला शिकवल्या नाहीत किंवा मी शिकले नाही. पण तिला वाचनाची आवड होती तिची वाचनाची आवड आमच्यात उतरली, आणि पुढील काळात मी लेखन करू लागले, फार जाणीवपूर्वक तिनं काही आमची जडणघडण केली नाही, पण आरामशीर आयुष्य तिच्यामुळे मी जगत होते हातात काॅफीचा कप, आणि जेवायला ताट ही कामवाली देत असे. आई सतत आजारी असायची तरी  तिचा कामाचा झपाटा मोठा होता.

मी स्वयंपाक लग्नानंतर करायला शिकले, लग्नाच्या आधी आजीने भाकरी करायला शिकवली होती, कधीतरी चपात्या ही करत होते….. पण तिच्या सारखं प्रत्येक पदार्थ निगुतीनं करणं मला कधी जमलं नाही पण तिच्या हाताची चव मात्र माझ्या हातात उतरली आहे. भरतकाम, विणकाम, शिवण मी ही केलंय पण तिच्या इतकं सुबक नसे….. तरीही नूतन शेटे च्या ओळीप्रमाणे आज म्हणावंसं वाटतं अस्तित्व आज माझे….त्या तूच एक कारण….आपलं अस्तित्व हे आपल्या आईवडिलामुळेच! माझं हस्ताक्षर वडिलासारखं सुंदर आहे. कुरळे केस वडिलांसारखे आहेत, वडिलांची तब्येत एकदम चांगली होती, आखाडा गाजवलेले पहिलवान होते ते!

मधुमेह, संधीवात हे आजार अनुवंशाने आईकडून आलेले, आणि आता जाणवतं हे आजार तिने कसे सहन केले असतील??

आरामशीर, सुखवस्तू आयुष्य आईवडीलांमुळे जगता आलं ही कृतज्ञता आहेच! पण मला लहानपणी आईवडीलांचा नेहमीच धाक आणि दराराच होता.

 

आई बाप असतात

फक्त जन्माचे धनी

आयुष्याचे गणित

सोडवायचे ज्याचे त्यानी

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print