मराठी साहित्य – विविधा ☆ चितळे मास्तरांनी शिकवलेला धडा ☆ श्री विनय माधव गोखले

☆ विविधा ☆ चितळे मास्तरांनी शिकवलेला धडा ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

गेल्या रविवारचाच प्रसंग…

आम्ही नवरा-बायको बिबवेवाडी रोडवरील चितळे मास्तरांच्या दुकानात थांबलो होतो. मिठाई घेऊन बाहेर निघत होतो. तेवढ्यात एक गिर्‍हाईक दांपत्य दुकानाच्या मालकांशी हुज्जत घालू लागले, त्या आवाजाकडे लक्ष गेले. त्यांनी चांगल्यापैकी म्हणजे १२००-१३०० रुपयांची खरेदी तर केली होती, पण घरून पिशवी आणायला विसरले होते! आता बाहेर उभ्या मोठया, पॉश कारपर्यंत सामान नेणार तरी कसे? दुकान मालकाकडे त्यांनी ’कॅरी बॅग द्या!” अशी मागणी चालवली होती. मध्यमवयीन, चांगले टापटिपीत कपडे घातले असले तरी बोलण्याचा बाज उध्दट वाटत होता. गृहस्थ बहुदा पुण्याबाहेरील पाहुणे असावेत. कारण चितळे मास्तरांकडे कॅरी बॅग मागण्याचा गधडेपणा दुसरं कोण करणार? आता मालक काय उत्तर देतात, हे ऐकायला आम्ही ’अनुभवी पुणेकरांनी’ कान टवकारले.

मालक: (कपाळावरची रेषही ढळू न देता) “सॉरी, आम्ही कॅरी बॅग देऊ शकत नाही.”

गिर्‍हाईक: अहो, पण मग मी माल बाहेर कार पर्य़ंत नेणार कसा?

मालक: पिशवी आणली नाहीत वाटतं?

गिर्‍हाईक: अहो, ती जर असती तर मागितली असती का कॅरी बॅग?

मालक: हे बघा, कॅरी बॅग देणे कायद्याने गुन्हा आहे, तुम्हालाही ह्याची पूर्ण कल्पना आहे. कायदा मोडणे आम्हाला परवडणारं नाही.

(गिर्‍हाईकाने आता अंधारात एक तीर मारला.)

गिर्‍हाईक: आणि तुमच्या गावातल्या दुकानात कशी देतात मग?

मालक: तुम्हाला कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे. आमचे नियम सगळीकडे सारखेच असतात. दुकान बदलले म्हणून नियम बदलत नाहीत आणि कॅरी बॅग देणे हे आमच्या नियमांत बसत नाही. (दुकानातील गिर्‍हाईकांमध्ये हलकासा हशा पसरतो.)

(तीर फुकट गेल्याने गिर्‍हाईक वैतागते. पण मागे न हटता दुसरा गुगली टाकते. गृहस्थांना बहुदा ’You Can Negotiate Anything’ सारखी मॅनेजमेंटची bestseller  पुस्तके नुकतीच वाचून त्याचा ज्वर चढला असावा. चितळे मास्तरांच्या दुकानात त्याचा यशस्वी वापर करायचाच ह्या हट्टाने पेटल्यासारखे बोलत होते. मधूनच अकारण इंग्रजीही पाजळत होते.)

गिर्‍हाईक: एवढ्या खरेदीवर तर तुमच्या पलिकडील ’जोशी’ वाले हव्या तेवढ्या कॅरी बॅग्ज देतील. मी त्यांच्याकडे जातो ना मग!

मालक: हे पहा, आमचे दुकान कॅरी बॅग्ज देण्याबद्द्ल प्रसिध्द नसून मालाच्या क्वालिटीबद्दल प्रसिध्द आहे!

गिर्‍हाईक: हे बघा मिस्टर, तुम्ही मुद्दाम विषय बदलता आहात. तुमच्या दुकानात आलेल्या गिर्‍हाईकाला मदत करण्याची मालक म्हणून तुमची जबाबदारी आहे की नाही? तुम्ही माझ्यासारख्या गिर्‍हाईकाला काय मदत करीत आहात, ते सांगा बरं मला.

मालक: हं, आता तुम्ही मदत मागत आहात म्हणून सांगतो, पिशवी आणायला विसरलेल्या गिर्‍हाईकांसाठी आम्ही कापडी पिशव्यांची सोय केली आहे. हे एवढे सामान नेण्यासाठी मी तुम्हाला आमच्या दुकानातील दोन कापडी पिशव्या देऊ शकतो.

(आता गिर्‍हाईकाच्या चेहर्‍यावर मंद स्मित पसरते आणि तो विजयी मुद्रेने आपल्या बायकोकडे सूचकपणे पाहतो. “कसा आणला लाइनीवर?” पण हा आनंद पुढचे वाक्य ऐकून मावळतो!)

पिशव्यांचे तुम्हाला २० रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील.

गिर्‍हाईक: (संतापलेल्या स्वरात) अहो पण एवढी मोठी खरेदी केल्यावर तुम्ही पिशव्यांचे कसले पैसे चार्ज करताय?

मालक: (शांतपणे) हे पहा, मी तुम्हाला पिशव्यांची मदत करू शकतो, पैशांची नव्हे. शिवाय आमच्या पिशव्यांचीही क्वालिटी उत्तम आहे, मी स्वत: वापरतो. तुम्हालाही पुढे चांगल्या उपयोगी पडतील.

….

…..

ह्या घडीला आम्ही दोघे दुकानातून बाहेर पडलो, त्यामुळे पुढील संवाद काही ऐकले नाही. बाईकवर बसलो आणि बटण-स्टार्ट केली. बायकोही मागे बसली. आता गियर टाकून निघणार त्याआधी उत्सुकतेपोटी मान वळवून दुकानाकडे नजर टाकली. त्याची बायको आधीच गाडीत येऊन बसली होती आणि नवरोबा हातात चितळे मास्तरांच्या मिठाईने भरलेल्या दोन कापडी पिशव्या घेऊन, मान खाली घालून आणि तोंडाने काहीतरी पुटपुटत बाहेर येताना दिसले. अर्थात विजय कोणाचा झाला हे वेगळं सांगायला नको.
आम्ही दोघेही गालातल्या गालात हसलो आणि मार्गस्थ झालो.

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लक्ष्मण रेषा ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

शिक्षण  B.A . मराठी

नोकरी EDC, A Semi Govt Financial Institution.

निवृत्ति नंतर मराठी लेखनास सुरवात. अनेक कविता प्रकाशनाच्या मार्गावर, दिवाळी अंकांमधून कथा, कविता प्रकाशित. वाचन लिखाण यांची आवड.

‘स्मृति कलश’ या ज्योती देशपांडे यांच्या पुस्तकाचे शब्दांकन, संपादन.

☆ विविधा ☆ ल्क्ष्मण रेषा☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

प्रभु श्रीराम कस्तुरीमृगामागे गेले, रामाची ‘धाव लक्ष्मणा धाव’ अशी आरोळी ऐकून सीता घाबरली. तिने लक्ष्मणाला रामाच्या मदतीसाठी जाण्यास भाग पाडले.  सीतेच्या सुरक्षिततेसाठी लक्ष्मणाने आश्रमाभोवती आपल्या बाणाच्या टोकाने एका रेषेचे कुंपण घातले आणि त्या बाहेर पाऊल न टाकण्याचा इशारा सीतामाईला देऊन तो रामाच्या आवाजाच्या दिशेने गेला.

पुढे काय झाले, हे आपण सर्वचजण जाणतो. त्याचे कारणही जाणतो. तेव्हापासून हेच कुंपण ‘लक्ष्मणरेषा’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तिथे सीतामाई होती, तिचं अपहरण झालं,  म्हणून लक्ष्मणरेषा फक्त स्त्रियांसाठीच असते, असा सोयीस्कर अर्थ नोंदवला गेला.

लक्ष्मणरेषा ही एकदाच ओढली गेली आणि तिचे उल्लंघन केल्याने जो अनर्थ घडला, त्यामुळे पुराणातील एक शिकवण किंवा एक इशारा म्हणून ती अजरामर झाली.

लक्ष्मणरेषा म्हणजे आत्मसंयमन, लक्ष्मणरेषा म्हणजे स्वत्वाचे रक्षण, लक्ष्मणरेषा म्हणजे आचारविचारांसाठी एक नियम,  लक्ष्मणरेषा म्हणजे चारित्र्य, शील यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी एक सुरक्षित कवच.

चारित्र्य आणि शील यांचे जतन आचार-विचार, आहार-विहार, याच्या माध्यमातून व्यक्त होते. आचार म्हणजे आपले वागणे,बोलणे, समाजात वावरणे, पोषाख, दुस-याला मान देणे, आदर करणे.

विचार म्हणजे पूर्वकाळातील अनुभव आणि संस्कार यातून आपल्याला झालेले ज्ञान व त्याचा सद्यः परिस्थिती साधलेला समन्वय.

आहार म्हणजे शरीराला आवश्यक,  प्रकृतीला अनुरूप असा आणि गरजेपुरताच करावयाचा अन्नपुरवठा.

विहार म्हणजे शरीर व मनाला उत्साह,  आनंद,  तरतरी देणारा अनुभव. तो व्यायाम असेल, पर्यटन असेल किंवा स्थलपालट असेल.

वरील चारही गोष्टी करत असताना,  सृष्टीवर त्या जगन्नियंत्याचे अधिपत्य आहे,  हे जाणून कर्म करणे. चांगले- वाईट दोन्ही कर्मे तो पहात आहे, याची जाणीव सतत ठेवणे. हे संस्कार मनावर असावे लागतात. यश, आनंद, समाधान ही चांगल्या कामाची फलश्रुती असते तर वाईट कृतीची शिक्षा ही भोगावीच लागते. हे ध्यानात ठेवून चांगले कर्म करणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे.

भारतीय संस्कृतीचा हा अलिखित पण अधोरेखित नियम आहे. समाजात वावरताना देहबोली ही महत्त्वाची असते.  ही एक अलिखित बोली आहे.ती व्यक्तीच्या व्यवहारातून, चालण्या बोलण्यातून राहणीमानातून, पोषाखावरून, व्यक्त होते.  ही संयमाची लक्ष्मणरेषा अतिशय काटेकोरपणे पाळावी लागते. जरासं सुद्धा रेषेबाहेर पडलेलं पाऊल पाय घसरायला कारणीभूत ठरू शकते. हे केवळ नीतीमत्तेच्या संदर्भात नाही तर सर्व बाबतीत आहे.

हा नियम स्त्री-पुरूष,  गरीब-श्रीमंत, लहान-मोठे,  सर्वांना लागू असतो. स्थलकाल, वर्णजाती,  याचे परिमाण न राखता, पृथ्वीवरच्या मनुष्याला सर्व समान लागू असतो. प्रत्येकाचे वर्तन, उपजीविकेचे व्यवहार यासाठी ही आहे.

ह्याची जाणीव घराघरातून वडीलधा-यांनी स्वतः सांभाळावी, तरूण वर्गाला करून द्यावी. शिक्षण संस्थांनी याबाबतीतले नियम कडक केले पाहिजेत. अनेक संस्थांनी अशी पावले उचलली आहेतही.

प्रत्येकानेआपल्या मनात लक्ष्मणरेषेचे भान ठेवलेच  पाहिजे. प्रत्येक वेळी,  प्रत्येक ठिकाणी आपले रक्षण करण्यासाठी आईवडील, भाऊ,दीर, मित्रमैत्रिणी, पोलिस बरोबर असतीलंच असं नाही,  पण मनातली लक्ष्मणरेषा आपल्याला संरक्षण नक्कीच देते.

धुंद होऊन जगताना संयम हवा. बोलताना संयम हवा.विचार करताना लक्ष्मणरेषेची जाणीव असावी. लक्ष्मणरेषा प्रत्येकाने आपल्या पुरती सीमित केली तरी खूप आहे.

छोटे-मोठे अनर्थ घडूच नयेत म्हणून लक्ष्मणरेषेचा आदर करावा, स्वतःच्या आणि दुस-यांच्याही.

 

© सौ. अमृता देशपांडे

पणजी

9822176170

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हॅप्पी स्पून डे….☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ विविधा ☆ हॅप्पी स्पून डे…. ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

नमस्कार मंडळी…जागतिक चमचा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा… ‘सेम टू यू‘ तरी म्हणा.. निदान अंगठा तरी….. काय? तुम्हाला‘ चमचा दिन‘ माहितीच नाहीये? आत्ताच “स्वयंपाक दिन” नाही का साजरा झाला व्हॉटस् अप वर?  ..म्हणजे माहिती असणारच… तरीही चमचा दिनाबद्दल नाही माहिती? आश्चर्य आहे. बरं ऐका …. हल्ली चमच्याशिवाय कुणाचेच पानही हलत नाही… बरोबर? विदेशी पदार्थ तर चमच्याशिवाय खाताच येत नाहीत अनेकदा. मग त्यांचे अनुकरण केलेच पाहिजे. म्हणून हल्ली घरोघरी “प्लेट-बाऊल-ग्लास” या जेवणाच्या सरंजामामध्ये चमचाही असतोच असतो. का काय?

आवडत्या आमटीची वाटीच उचलून तोंडाला लावणं आता अशिष्ट समजलं जातं. अळूच फतफत सगळ्या बोटांनी गोळा करून तोंडात घालून सूर्र् ss  आवाज करत तृप्त व्हायचं, बासुंदी-खिरीच्या वाट्याच्या वाट्या मनसोक्त तोंडाला लावत मनमोकळी ढेकर द्यायची, हा तर चक्क गावंढळ पणाच ठरतो हल्ली. त्या ऐवजी बोटांची देखणी हालचाल करत चमचा हळूवारपणे अशा पदार्थांच्या अर्ध्या पाऊण भरलेल्या बाऊलमध्ये बुडवून, एकही थेंब न सांडता ओठाला लावायचा, आणि फूर्र.. बीर्रा असला कुठलाही असभ्य आवाज न करता जिभेवर रिकामा करायचा… तोपर्यंत तो पदार्थ गार होऊन जातो, चव कळत नाही, असले वायफळ आरोप अजिबात करायचे नाहीत. शेवटी sophisticated दिसणं महत्वाचं.

याचं बाळकडू आताशा लहानपणापासूनच पाजलं जातं. बाळाला बाटलीतून दूध पाजणे आरोग्याला घातक असल्याने ते चमच्याने पाजावे असा विचार पुन्हा प्रचलित झाला आहे. त्यामुळे तान्हेपणा पासूनच बाळाची चमच्याशी ओळख होते. पुढे त्याला  “आत्मनिर्भर” करण्याच्या उदात्त हेतूने, “हायचेअर” वर बसवून, समोर पोळीचे तुकडे व भाजी ठेवली जाते. बाळ एक तुकडा महत्प्रयासाने चमच्यातउचलते. मग तो भाजीत टेकवून पुन्हा उचलण्याचे कष्ट करण्यापेक्षा ते हुशार पिढीतले मूल, फक्त पोळीचा तुकडा तोंडामध्ये कोंबून, मग चमच्यात भाजी घेतल्यासारखे करून तो तोंडाला लावतो. हीच — “आत्मनिर्भरता”. इथे पोटात भाजी किती जाते हा मुद्दा गौण ठरतो. पण चमच्याने जेवण्याच हे नाटक मुलं इतकं लांबवतात की शेवटी मम्मी वैतागून त्याला हाताने भरवून टाकते, हे इथे महत्वाचे नाही.

तर अशा रीतीने “चमचा” आपल्या आयुष्यात लहानपणापासूनच महत्वाची  भूमिका बजावायला लागतो. आणि हे महत्त्व लक्षात घेऊनच त्याच्याप्रती कृतज्ञता म्हणून हा “चमचा डे” साजरा केला जातो…. बरोब्बर…. Mother‘s डे, father‘s डे कसे वर्षातून एकदा साजरे केले की इतिकर्तव्यता होते.. तसंच. पण एक फरक आहे. मदर-फादर प्रत्येकाला एकेकच असतात. पण चमचे?…. प्रत्येक घरात इतके वेगवेगळ्या प्रकारांचे, आकारांचे आणि उपयोगाचे चमचे असतात की,  “माझ्याकडे सगळे मिळून इतके चमचे आहेत”, असं कमालीची गृहकृत्यदक्ष स्त्रीही १००% खात्रीने सांगू शकणार नाही हे मी खात्रीने सांगू शकते.

याशिवाय घराबाहेरही कित्ती चमचे असतात. शेजारच्या दारापासूनच त्यांची जी रांग सुरू होते, ती थेट फक्त दिल्लीपर्यंतच नाही, तर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचलेली आहे. आणि त्यांचं काम इतकं वैशिष्ट्यपूर्ण असतं की ” चमचेगिरी” हा शब्द त्यांच्यासाठी पुरेसा नसतो. विशेष म्हणजे हे चमचे अदृश्य असतात. त्यांचे रंग-रूप- आकार आणि कामाचा आवाका, अगदी मुरब्बी मातब्बरांनाही समजू शकत नाही. तरीही सगळ्याच प्रकारच्या कार्यक्षेत्रात ते सतत वापरले जातात. अहो घरातले चमचे एकवेळ चिकाटीने नेमके मोजता येतील, पण हे घराच्या बाहेरचे चमचे?….ते चमचे आहेत हेच मुळात कितीदा समजत नाही, मग मोजणं तर लांबच… म्हणजे बघा, चमचा कुठल्याही प्रकारचा असला , तरी त्याचं काम कुणासाठी तरी गरजेचं आणि महत्वाचं असतंचना? मग त्याच्याबद्दल जाहीर कृतज्ञता व्यक्त करणं हा औपचारिक रिवाज पाळायला हवाच …. पटतंय ना? मग म्हणा तर ….”जागतिक चमचा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ” …….

 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मैत्र फुलांची ओंजळ ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ विविधा ☆ ? मैत्र फुलांची ओंजळ ?☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

आम्हा दोघा पती-पत्नींना माणसे जोडायची आवड आहे. याच ओढीतून पंधरा वर्षांपूर्वी आम्ही सांगलीत आमच्या घरी एका ग्रुपची स्थापना केली. सोमवारी जमतो म्हणून ‘सोमवार ग्रुप’. १२-१५ जणांचा हा ग्रुप ५० जणांचा कधी झाला हे कळलेच नाही. ज्ञान- विज्ञान- माहिती, छंद आवडीनिवडी, सुखदुःख, जिवाभावाचे सर्व काही एकमेकांशी वाटून घेत हा ग्रुप एक मोठे कुटुंब बनले आहे. आज आम्ही तिथून पुण्यात आलो तरी या ग्रुपशी नाळ घट्ट बांधलेली आहे. नित्य संवाद सुरू असतो.

काही वर्षांपूर्वी माझ्या मिस्टरांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या या ‘सोमवार ग्रुप’ साठी आम्ही एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाची रूपरेषा अशी काहीच ठरवलेली नव्हती. एकत्रित गप्पा सुरू होत्या. एका मैत्रिणीची बहीण आमच्या ग्रुपचा कार्यक्रम पाहायला आलेली होती. पुण्याची ही पाहुणी मैत्रीण सुरेल गायिका निघाली. तिने आग्रहाखातर गाणे म्हटले ‘ओवी आणि अभंगाने भुई सारी भिजे ‘, आणि पाहता पाहता सगळ्यांचा मूडच पालटला.

कोणीतरी ह्यांना मागच्या आठवणी विचारल्या. आमच्या लग्नाच्या संदर्भातील प्रश्नांनी मन भूतकाळात गेले. असंख्य आठवणींनी पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. मैत्रिणींच्या चेष्टामस्करीला जोर चढला. जणू सगळ्यांच्यातच तरूणाईचे चैतन्य संचारले होते. आमच्या सदस्यांचा वयोगट साधारणपणे ३५ते ८२-८३ वर्षांचा आहे. जवळजवळ पंचवीस तीस जण हजर होते. हास्यविनोदात वय विसरून सर्व जण मन मोकळे झाले होते.

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यासाठी इतर गोष्टींबरोबरच प्रत्येकापाशी मुखावरचा निर्मळ आनंद आणि मनापासून भरपूर शुभेच्छा होत्या; ज्यामुळे खूपच भारावून जायला झाले. शेवटी मैत्री ही आयुष्यातील मोठी मिळकत असते. एका मैत्रिणीने तर आम्हा दोघांना दोन ओंजळी भरून अतिशय सुवासिक अशी तिच्या बागेतली जुईची फुले दिली. तिची ही सुगंधी भेट तर फारच अनमोल अशी होती. शेवटी मैत्रीत ‘देणं-घेणं’ काही नसतंच. असतो फक्त एकमेकांना आनंद वाटायचा. ह्या फुलांनी आम्हा सगळ्यांनाच खूप आनंद दिला. सारा हॉल सुवासाने भरून गेला. एका मैत्रिणीने एक छानशी कविता वाचली. या छोटेखानी कार्यक्रमाचा हा एक मनोहारी आनंद मेळावा झाला. आमच्यासाठी हा आयुष्यातील एक सुखद क्षण ठरला आणि याची सांगता झाली पाहुण्या मैत्रिणीच्या गाण्याने ” जीवनात ही घडी…… !”

खरोखरच ‘ही घडी’ मनात जपून ठेवावी अशीच होती. आपण आयुष्यात एकमेकांशी अनेक नात्यांनी बांधलेले असतो. पण त्यात मैत्रीचं नातं हे अतिशय मोलाचं असतं. हक्क-जबाबदाऱ्या  यांच्या कसल्याही फूटपट्ट्या नसणारी निरपेक्ष मैत्री ही आयुष्यातील वाटचालीची शिदोरी असते. सर्व सुख-दु:खात, कठीण प्रसंगात, हास्यविनोदात साथ देते ती मैत्री. या मैत्रीमुळे ‘एकला चलो रे ‘चा एक तांडा बनतो. या मैत्रीच्या जोरावरच आपण आयुष्याची वाटचाल यशस्वीपणे करत असतो. अशी निखळ मैत्री ज्यांना लाभली ते खरोखरच भाग्यवान. या मैत्रीचा स्नेह सुगंध मनात सदैव दरवळत राहतो आणि आपली आयुष्य निश्चितच पुलकित होतात.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ थोरवी ज्ञानेश्वरीची ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

संक्षिप्त परिचय 

शिक्षण – BA मराठी, M. A. भरत नाट्यम

नृत्या मध्ये पारंगत, कविता, लेख, दिवाळी अंकांमधून प्रकाशित . स्वतःचा कथा, नकला, नृत्य यांचा कार्यक्रम प्रसारणाच्या टप्यावर.

आदरणीया सुश्री शिल्पा मैंदर्गी जी हम सबके लिए प्रेरणा स्रोत हैं। आपने यह सिद्ध कर दिया कि जीवन में किसी भी उम्र में कोई भी कठिनाई हमें हमारी सफलता के मार्ग से विचलित नहीं कर सकती। आदरणीय सौ अंजली गोखले जी का आभार। ई- अभिव्यक्ति ऐसी प्रतिभाओं को नमन करता है – ब्लॉग एडिटर – हेमन्त बावनकर 

 

☆ विविधा ☆  थोरवी ज्ञानेश्वरीची ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौअंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

 

‘ज्ञान देव बाळ माझा, सांगे गीता भगवंता

लक्ष द्या हो विनविते .

मराठी मी त्याची माता’

माझे हे सगळ्यात आवडते गाणे आहे. B.A. ला मराठी शिकत असताना ज्ञानेश्वर माउलींची ओळख झाली आणि मनोमन मी त्यांचं शिष्यत्व पत्करलं. त्यांच्याबद्दल जे जे ऐकायला मिळालं ते सगळं माझ्या हृदयावर, मनावर कोरले गेले. त्यातलीच एक छोटी आठवण सांगते.

ज्ञानदेवांनी आपल्या गुरूंच्या, निवृत्तीनाथांच्या सांगण्यावरून भावार्थ दीपिका लिहिली. तीच पुढे ज्ञानेश्वरी म्हणून उदयाला आली. त्यावेळी लोकांना ज्ञानेश्वरी इतकी भावली इतकी भावली की लोकांनी ज्ञानदेवांची हत्तीवरून मिरवणूक काढायची ठरवली. ज्ञानदेवांच्या संमतीशिवाय हे होणे अशक्य. म्हणून सगळेजण ज्ञानदेव आंकडे परवानगी मागायला गेले. पण ज्ञानदेव कसले ऐकत आहेत? नम्रपणे त्यांनी सांगितलं, “अहो, हे केवळ गुरुकृपेने घडलं आहे. त्यांचाच तो मान आहे”. झालं सगळे निवृत्तिनाथ कडे आले. तेही निस्पृह.अजिबात ऐकायला तयार नाहीत.

कोणी म्हणाले सोपान लहान आहे, त्याला हा मान देऊया. मुक्तालाही लोकांनी विचारले. मुक्ता म्हणाली, “अहो,आम्ही संन्यासाची मुले, ज्ञानोबांनी लिहिलेला हा ग्रंथच खरा श्रेष्ठ आहे. तोच सर्वांना पुढेही मार्गदर्शन करणार आहे. खरामान या ज्ञानेश्वरीचा आहे. आम्ही निमित्तमात्र आहोत.”

अखेर निश्चित झाले. ज्ञानेश्वरीचा हत्तीवरून सन्मान करायचा, मिरवणूक काढायची. धन्य ती भावंडे ज्यांनी ज्ञानेश्वरीची थोरवी लिहिली गायली पटवली अन्न आचरणात आणून धन्य केली.

ज्ञानदेवांचे गुरु निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव यांचे मोठेपण आजही टिकून आहे. सातशे वर्षानंतरही ही ही ग्रंथसंपदा तोलामोलाचे आहे. आजही त्याची थोरवी, महत्व, मार्गदर्शन आपल्याला अनमोल ठरते आहे.

 

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संवाद ☆ श्री एस्.एन्. कुलकर्णी

श्री एस्.एन्. कुलकर्णी 

☆ विविधा ☆ संवाद ☆ श्री एस्.एन्. कुलकर्णी ☆ 

संवाद हा मनुष्याच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग/घटक आहे. संवादाशिवाय माणूस राहुच शकत नाही. दोन व्यक्तिंमध्ये नाते निर्माण होते तेदेखील त्यांच्यामधील सतत घडणार्‍या संवादामुळेच. संवादामुळे नुसतेच नाते निर्माण होत नाही तर ते फुलते, विकसित होते आणि ते सुदृढही होते. मग नाते कोणतेही असो. मैत्रीचे असो, पतिपत्नीचे असो, आईवडील, भाऊबहीणीचे असो. या सर्व नात्यांचे मूळ सुयोग्य संवादातच असते. संवाद संपला, थांबला अथवा खुंटला तर त्या नात्याला घरघर लागलीच म्हणुन समजा. तेंव्हा नात्यामध्ये सतत संवाद हा हवाच. रोजच्या जीवनात म्हणुन संवादाला फार महत्व आहे.

संवादामधून आपण अनेक गोष्टी साध्य करीत असतो. संवादामुळे दोन व्यक्तिंमधील गैरसमज दुर होतात. नियमित संवाद असेल तर गैरसमज निर्माणच होत नाहीत.

संवाद म्हणजे बोलणे. नुसतेच बोलत राहणे म्हणजे संवाद नव्हे. दुसरे काय म्हणताहेत, दुसर्‍यांचे म्हणणे काय आहे हे शांतपणे लक्ष देऊन ऐकणे यालासुध्दा संवादच म्हणतात.

पण बर्‍याचवेळा आपण संवादाशिवायही आपण आपले म्हणणे सांगु शकतो. आपण आपल्या देहबोलीतूनही (body language) अनेक गोष्टी व्यक्त (राग, प्रेम, आनंद) व्यक्त करीत असतो. अशावेळी बोलण्याची आवश्यकता नसते. एक गोष्ट मात्र नक्की की आपण हे नेहमी पाहीले पाहीजे की संवाद बंद होता कामा नये, संवाद हरवता कामा नये.

दुसर्‍या व्यक्तिशी आपण सहज संवाद साधु शकतो. पण आपल्याला स्वत:शी संवाद साधता आला पाहीजे. स्वत:शी बोलता आले पाहीजे. यातुनच आपण स्वत:ला ओळखु शकतो. बर्‍याचवेळा आपण अनेक चुका करतो. स्वत:शी केलेल्या संवादातुनच या चुका आपल्याला ऊमगतात.एकदा का चुक समजली की ती दुरूस्त करू शकतो किंवा भविष्यात आपण त्या चुका करणार नाही. स्वत:शी संवाद सुरू केला की आपण अहंगड/न्युनगंडावर सहज मात करू शकतो कारण यामधुन आपण स्वत:ला ओळखु लागलेलो असतो. स्वत:शी केलेल्या संवादावरून आपण नॉर्मल लाईफ जगु शकतो.

संवाद जसा दोन व्यक्तिंमध्ये घडत असतो तसाच तो दोन देशांमध्ये/दोन राष्टांमध्ये सुध्दा घडत असतो. दोन देशांमध्ये नियमित संवाद असेल/ बोलणे असेल तर सर्व व्यवहार सुरळीत होतात. व्यापार तसेच संबंध सुरळीत होतात. अगदी युध्दजन्य परिस्थिती असेल आणि त्या देशांमध्ये संवाद असेल तर ती परिस्थिती निवळण्यात मदतच होते. युनोचे कामच हे आहे की सर्व राष्टांना एकत्र आणणे आणि त्यांच्यामध्ये नियमित संवाद घडवून आणणे. त्यामुळे संवादाला आपल्या आयुष्यात फार महत्व आहे.

तेंव्हा आपण काळजी घेऊया की आपल्या दैनंदीन जीवनात संवाद हरवणार नाही.

©  श्री एस्. एन्. कुलकर्णी

वारजे, पुणे-४११०५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सलीलप्रवाहात डोकावताना…. ☆ डाॅ.मेधा फणसळकर

डाॅ. मेधा फणसळकर

☆ विविधा ☆  सलीलप्रवाहात डोकावताना…. ☆ डाॅ. मेधा फणसळकर ☆

आम्ही टिळक आयुर्वेद महाविद्यालयातील सर्व कलाप्रेमी वैद्य लोक कॉलेजमध्ये असताना एका कलासक्त, संस्कृत विषयाच्या प्राध्यापिक असणाऱ्या “ माधवी पटवर्धन” या व्यक्तिमत्वाबरोबर कलेच्या माध्यमातूनच जोडल्या गेलो. व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या आम्हा मुलांमधील कलेच्या ओढीला हलकेच साद घालत सुरु केलेले कलामंडळ म्हणजे एक आनंदाचे झाड होते. तेच झाड पुन्हा एकदा अतुलच्या प्रयत्नाने पुन्हा बहरले. आम्ही ऑनलाईन भेटू लागलो आणि जवळजवळ वीस वर्षांनी ते मैत्र पुन्हा एकदा उजळले. त्यातीलच कालचे पुष्प म्हणजे ‛ सलील कुलकर्णी’ यांच्याशी झालेल्या गप्पा! सलीलप्रवाहात डोकावताना आलेली अविस्मरणीय क्षणाची अनुभूती!

सलीलजींच्या भाषेत सांगायचे तर “ विकिपीडियावर जे नाही ते ज्ञान केवळ आजी- आजोबांकडे आहे आणि अशा अनुभवाच्या पायाशी नेहमी बसावे” आम्हीही काल असाच काहीसा अनुभव घेतला. आणि एक संपन्न अनुभवाचा, विचारांचा खजिना आम्हाला गवसला.

सलीलजींच्या गाण्यातून, लेखनातून आणि वेगवेगळ्या कार्यक्रमातून ते आपल्याला नेहमी भेटतच असतात. पण काल झालेल्या ‛या हृदयीचे त्या हृदयी’ संवादातून हे व्यक्तिमत्त्व अधिकच उलगडत गेले. आज महाराष्ट्रात राहूनही उत्तम मराठी शब्दसुद्धा कानावर पडणे दुरापास्त झाले आहे. अशा वेळी सलीलजींच्या बोलण्यातील शब्दसंपत्ती, सखोल चिंतन मनाला अधिक समृद्ध करुन गेले. ऐकण्याची प्रक्रिया कमी झाली आहे याबद्दल त्यांना खंत वाटते. एखादे गाणे कित्येक वेळा ऐकले तरी प्रत्येक वेळी काहीतरी नवी अनुभूती देते. म्हणूनच ते म्हणतात ,“ गप्पा आणि भाषणामध्ये फरक आहे आणि त्यामुळेच मला गप्पा मारायला आवडतात.”  कारण त्यात  देवाण- घेवाण आहे. बोलणे आणि ऐकणे या दोन्ही प्रक्रिया त्यात आहेत.

आपले वैद्यकीय शिक्षण आणि कार्यक्षेत्र याची निवड करायची वेळ आली तेव्हा मनाला पटला तोच निर्णय घेतला आणि संगीतक्षेत्र निवडले. हे सांगताना ते म्हटले,“ ज्या गावात राहायचे नाही तिथे बंगला का बांधायचा?” अशा सहज सोप्या उपमा- उदाहरणानी हा सलीलप्रवाह आम्हाला त्यांचा जीवनप्रवास उलगडून दाखवत होता.

सातशेच्या वर त्यांनी संगीतरचना केल्या. बरेच वेळा आधी चाल आणि मग त्यावर शब्द सुद्धा बांधले. पण ठिपके जोडून रांगोळी काढण्यापेक्षा एखाद्या मनस्वी चित्रकाराने कुंचल्याच्या सहज मारलेल्या फाटकाऱ्यातून अप्रतिम चित्र उमटावे तसे गाणे आतून आले तरच रसिकांपर्यंत सहज पोहोचते असे त्यांना वाटते.

हृदयनाथ, लता मंगेशकर या नेहमीच त्यांच्या गुरुस्थानी असणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यांच्याविषयी भरभरून बोलताना ते म्हणाले,“ झाड जितके मोठे तितका त्याचा विस्तार मोठा! ते ओरबाडण्यापेक्षा त्याचे सतत निरीक्षण करावे  आणि ते आपल्या आत रुजवण्याचा प्रयत्न करावा.”

अशाच गप्पा रंगत असताना “पुढच्या पिढीसाठी काय संदेश असेल किंवा काहीतरी उत्तम- अभिजात पुढे रुजावे असा गाण्यातून प्रयत्न असतो का?” असे विचारल्यावर ते लगेच म्हणाले,“ माझ्या मुलांनी काय ऐकावे हे मी ठरवू शकत नाही. पण उत्तम तेच त्यांच्या कानावर पडावे असा विचार कदाचित अंतर्मनात असेल आणि त्यातून जर असे संगीत निर्माण होत असेल आणि त्यातून पुढची पिढी घडली तर जास्त आनंद आहे.”

प्रत्येक गाणे हे खरं तर मूळची एक कविता असते हे आपण जाणतोच. जेव्हा अशा कवितांना संगीतकाराचा परिसस्पर्श लाभतो तेव्हा त्याचे सोने होते. पण त्यातही एक संगीतकार म्हणून त्यांनी एक विचार मांडला जो खरोखरच विचार करण्यासारखा आहे. ते म्हणतात,“ प्रत्येक वृत्तबद्ध कविता चालीत बांधण्याचा अट्टाहास करु नये. काहीवेळा सूरांनी त्याची धार बोथट होते आणि कवितेचा भाव हृदयापर्यंत पोहचू शकत नाही.”  एक मनस्वी कलाकारच एखाद्या कालाकृतीकडे इतक्या डोळसपणे बघू शकतो. म्हणूनच या सलीलप्रवाहात डोकावताना खोल असला तरी त्याचा नितळ तळ स्पष्ट दिसत होता. या प्रवाहाची स्वतःची अशी मनोभूमिका, दिशा ठरलेली आहे. आणि ती सखोल चिंतनातून आली आहे. म्हणूनच त्या प्रवाहातून वाहणारा विचारांचा खळखळता झरा काल आम्हाला निखळ आनंदात चिंब भिजवून गेला.

 

©  डाॅ. मेधा फणसळकर

9423019961

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खार! ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

 ☆ विविधा ☆ खार! ☆ श्रीमती अनुराधा फाटक  ☆ 

‘लहान सुंदर गोजिरवाणी अशी दिसे ही खार, लुसलुशीत हे अंग तिचेच शेपूट गोंडेदार!’

अशा वर्णनाची बालगीतात कुतूहलाचे स्थान निर्माण करणारी खार आजची नसून रामायणकालापासून तिची सर्वांना ओळख आहे .

रावणाच्या तावडीतून सीतेला सोडविण्यासाठी लंकेत प्रवेश करता यावा म्हणून वानरसेनेच्या मदतीने श्रीरामानी सेतू बाधंण्याचे

काम सुरु केले त्यावेळी एक खार सतत समुद्रातील वाळूत लोळून सेतूबांधावर येऊन आपले शरीर झाडत असल्याचे प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आले. खारीचे हे काम पाहून त्यांनी कौतुकाने तिच्या पाठीवरून हात फिरविला. त्याची निशाणी अजूनही समस्त खार जमातीवर दिसते.खारीच्या शरीरावर असणारे पट्टे म्हणजे खारीच्या पाठीवर हात फिरविलेले श्रीरामांच्या बोटांचे ठसे समजले जातात. आपल्या कुवतीप्रमाणे दुसऱ्यांना मदत करणारी, स्ततःच्या इच्छेनुसार, कोणाचीही बळजबरी नसताना काम करणारी माणसे दुसऱ्यांच्या कामात खारीचा वाटा उचलताना दिसतात.

सतत वृक्षावर राहणारा, प्रत्येक वस्तू कुरतडून खाणारा  सर्वसंचारी असा निरुपद्रवी प्राणी म्हणजे खार! काही मुले एखादी वस्तू दाताने कुरतडत। बसतात तेव्हा खारीसारखा कुरतडत बसू नको असे म्हणतात. स्वतःच्या शरीराचा तोल सांभाळण्यासाठी खारीला झुपकेदार शेपूट उपलब्ध झाली असावी. खारीसारखी चपळ वृत्तीची मुले पाहिली की,सर्वांना आनंद होतो. खारीचा वाटा उचलून सर्व मुलांनी काही चांगले उपक्रम केले तर राष्ट्र उभारणीच्या कार्याचे उद्याचे चित्र नक्कीच आशादायक असेल. आज अजगराप्रमाणे सुस्तावलेल्या समाजात चेतना निर्माण करण्यासाठी खारीसारख्या कार्यक्षम प्रवृत्तीच्या माणसांची गरज आहे.

झरझर झाडावर, सरसर खाली पळणारी खार महत्वाचीच आहे.

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रमोशन ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ विविधा ☆ प्रमोशन ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

स्त्रीने असिस्टंट म्हणून काम करणं हे सर्वमान्य आणि सर्वसामान्य आहे. पण ती जेव्हा बॉस म्हणून खुर्चीवर बसते तेव्हा तिला अनेक पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो. तिची ‘बढती ‘ही व्यक्तिशः मानाची,जबाबदारीची,प्रतिष्ठेची असली तरी बरेच वेळा कुटुंबातल्या इतरांसाठी गैरसोयीची होते. तिच्या रुटीनच्या नोकरीने घराचा जो जम

बसलेला असतो, तो विस्कटतो.प्रमोशनची सुरुवात बहुधा बदलीने होते.

तिथे संघर्ष सुरु होतो. पहिल्याने हा संघर्ष तिच्या मनात होतो.बढतीमुळे दैनंदिनीत बदल,नवीन कामाचा अभ्यास, जबाबदारी, संसार संभाळताना हे जमेल?कशाला सुखाचा जीव दुःखात घाला!अशी द्विधा मनस्थिती होते. अशा वेळी तिला कोणी आधार दिला, प्रोत्साहन दिलं तर ती वरिष्ठ म्हणून उत्तम काम करू शकते

सरिता आकाशवाणीत ड्यूटीऑफिसर होती. तिला प्रमोशन मिळालं. पण बदली होणार होती. तिची दोन्ही मुलं शाळेत जाणारी ,  बऱ्याच अडचणी होणार होत्या.पण सरिताची नवविवाहित जाऊ –ती मदतीला धावली. ती सरिताला म्हणाली,” वहिनी, तुम्ही प्रमोशन घ्या. मी मुलांच अभ्यास घेण्यापासून सर्व करीन, सासुबाईना समजावून सांगेन. मधून मधून या. मुलांना भेटा, इकडची काळजी करू नका.”

सरिताने अशी दोन वर्ष काढली. मग मुलांना तिकडे न्हेलं. आता तिचा नवरा मधून मधून तिच्या गावी येतो. सासूबाई पण चेंज म्हणून येतात. अशी साथ घरातल्यानी दिली तर सरिता प्रमोशनच्या पुढच्या पायऱ्याही चढेल.

स्वाती एक माध्यमिक शिक्षिका. तिच्या पदव्या, लवकर नोकरीला लागल्यामुळे सिनिऑरिटी, त्यामुळे  मुख्याध्यापकाची जागा तिला इतर सहकारी मैत्रीणींच्या आधी मिळाली. शैला स्वातीची जिवलग मैत्रीण.तिला वाटलं चला, आता आपल्याला थोडी मोकळिक मिळेल.कामाच्या बाबतीत ती निष्काळजीच होती. सहामाही जवळ आली तरी तिच्या विषयाचा पोर्शंन पूर्ण नाही. दहावीच्या मुलांनी तक्रार केली. स्वातीने शैलाला ऑफिस मध्ये बोलावल, विचारलं.

“गेल्या महिन्यात आजारी होते तुला माहितच आहे की.”

“पण जादा तास घेऊन अभ्यासक्रम तू पुरा करायला हवा होतास.”

“आता मी असं करते.शिकवलय तेव्हढ्यावरच पेपर काढते. म्हणजे मुलं चिडायची नाहीत.”

“अग, दहावीचा पेपर बोर्डाच्या फॉरमँटप्रमाणे काढायला हवा. मुलांना सराव नको का व्हायला?तू पोर्शंन पुरा कर.”

शैलाने ऐकलं नाही. पालकांनी तक्रारी केल्याच.स्वातीची दोन्हीकडून पंचाईत. मग ती कडकपणे वागू लागली. काही मैत्रिणीनी समजून घेतलं काही तुटल्या.स्वातीने स्टाफ मिटिंगमध्ये सगळं क्लिअर केलं.कारण तिला आपल्या पदाची प्रतिष्ठा राखायची होती.ती म्हणाली, “मी भेदभाव करणार नाही. पुरुष शिक्षकांनी लक्षात घ्यावं, स्टाफमधल्या शिक्षिका तुमच्या इतक्याच कर्तव्यतत्पर आहेत पण काही वेळा त्यांना सवलती द्याव्या लागतात. कारण त्या माता आहेत. तुमच्या घरच्या स्त्रियांकडे बघा. स्त्री म्हणून सवलत नाही, पण सहानुभूती दाखवायला हवी ना! गैरसमज नको. त्यावेळी तरी पुरुष शिक्षकांनी माना डोलावल्या

आपली मैत्रीण  बॉसच्या खुर्चीवर बसली तर तिच्या सहकारी स्त्रियांनी तिला समजून घ्यायला हव.तिला ‘येस बॉस ‘म्हणताना आनंद , अभिमान वाटायला हवा. पण प्रत्यक्षात असं होतं का? की स्त्री स्त्रीची शत्रू ठरते?  तिच्या प्रमोशनवर अशी अनेक प्रश्न चिन्हं आहेत.

 

© श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

मो. – 8806955070.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी ☆ सुश्री स्नेहा दामले

 ☆ विविधा ☆ वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी ☆ सुश्री स्नेहा दामले

आपलं जगणं बऱ्याच अंशी वृक्ष-वनस्पतींवर अवलंबून असतं .. आपल्या तोंडचा घास आणि आपला श्वास सगळी वनस्पतींची देणगी..

तुकाराम महाराजांनी उगीच नाही त्यांना सोयरे म्हटलं.. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी’

आपल्या कुटुंबात,आपण आपल्या सोयरे मंडळींना/पाव्हणे मंडळींना खूप आदराचं, मानाचं स्थान देतो.

तसा आदर आणि मान, आपलं जगणं ज्या सोयर्‍यांवर अवलंबून आहे, त्या या वनस्पतींना आपण देतो का?

उत्तर बहुतेक नाही असंच येतं; आपण अति परिचय झाल्यासारखं फारच गृहीत धरतो त्यांना किंवा चक्क दुर्लक्ष करतो त्यांच्याकडे…

नर्मदालय’ संस्थेच्या माध्यमातून मध्यप्रदेशातील नर्मदा किनारीच्या मागास व वंचित मुलांसाठी शिक्षण विषयक काम करणाऱ्या भारती ठाकूर . त्यांची एक गोष्ट मध्यंतरी वाचली होती.. गोष्टीचं शीर्षक होतं ‘क्षमा..’

शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून एकदा रागाच्या भरात भारती ताईंनी आपल्या बागेतलं १०-११ फुटी जास्वंदीचं झाड  अगदी दोन अडीच फुटांपर्यंत छाटलं..

आपल्या या अविवेकी कृत्याचा त्यांना लगेच पश्चात्तापही झाला.. पावसाळा होता त्यामुळे झाड पुन्हा लगेच वाढलं पण शेजाऱ्यांच्या कंपाउंडमध्ये एकही फांदी वाढली नाही परत! झाड वाढलं पण फुल मात्र एकही येईना; खतपाणी, सगळे प्रयोग करून झाले. मग कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्राच्या दीदींच्या सांगण्यावरून भारतीताईंनी त्या झाडाची क्षमा मागितली; त्याच्याशी रोज संवाद करू लागल्या, गप्पा मारू लागल्या.. एक वेगळंच जिव्हाळ्याचं नातं त्यांचं झाडाशी निर्माण झालं आणि मग काही दिवसात झाड कळ्यांनी पुन्हा भरून गेलं . झाडाने त्यांना ‘क्षमा’ केली होती..

ही गोष्ट मी वाचली आणि ती माझ्या अगदी हृदयाला भिडली.. मलाही झाडांची आवड आहे. झाडं आपल्याला प्राणवायू देतात, त्या जीवावर आपण खरं तर जगतो; पण आपण काय करतो त्यांना जगण्यासाठी? या विचाराने मी या मातीतल्या, देशी आणि नर्सरीत सहसा न आढळणाऱ्या झाडांची बियांपासून रोपं बनवते आणि मग कुणाला हवी त्याला देऊन टाकते लावायला. बिया एकत्र रुजत घालते आणि मग रोपांनी डोकं वर काढलं की त्यांना वेगळं काढून वेगवेगळ्या पिशव्यांत लावते. याचं कारण प्रत्येक बी वेगवेगळ्या पिशवीत लावायला आणि त्या पिशव्या ठेवायला माझ्याकडे तेवढी जागा नाही. हे रोप असं काढून पिशवीत लावलं की ते काढताना त्याच्या नाजूक मुळांना थोडी तरी इजा होतेच आणि मग त्या चिमुकल्या रोपाची पाने एक दिवस जरा मलूल असतात.. पुन्हा दुसऱ्या दिवशी नवीन परिस्थितीशी जुळवून घेत टवटवीत होतात. हा माझा नेहमीचा अनुभव..

वरील गोष्ट वाचली तेव्हा मी रुजत घातलेल्या गोकर्णीचं रोप पिशवीत लावण्याजोगं झालं होतं, यावेळी मी जरा अधिक हळुवारपणे ते मातीतून काढायचा प्रयत्न केला पण तरीही त्याला थोडंसं दुखलं असणारच अशा विचाराने सॉरी हं,दुखलं का रे तुला? असं म्हणत त्या पिटुकल्या रोपाशी मी संवाद केला आणि काय सांगू..या एका वाक्याने माझं मलाच केवढं बरं वाटलं..’आता तुला नवीन जागा देते हं’ असं म्हणून मी ते पिशवीत लावलं. थोडी माती दाबली, पाणी घातलं. भारतीताईंसारखा अनुभव यावेळी मलाही आला. यावेळी पिशवीतल्या रोपट्याने दुसऱ्या दिवशी मान टाकली नाही.

वनस्पतींनाही संवेदना असतात, त्या प्रतिक्रिया देतात हे सगळं आपण शिकलेलं असतो. विज्ञानाने  ते सिद्धही केले आहे.. आपल्या ऋषीमुनींना मात्र ही गोष्ट आधीपासून माहित असणार..पद्मपुराणात तो श्लोक आहे. कोणतीही वनस्पती आपल्या उपयोगासाठी तोडण्या आधी तिची प्रार्थना करून हा श्लोक म्हणायचा असतो.

आयुर्बलम यशो वर्च: प्रजा: पशून्वसूनिच |

 ब्रह्म प्रज्ञां च मेधां च तत्वं नो देहि वनस्पते ||

हे वनस्पती तू आम्हाला आयुष्य, उत्तम बल, यश, धन, प्रज्ञा आणि चांगली बुद्धी दे..

हा श्लोक मी वाचला होता आधी; पण त्या मागचा ऋषींचा वनस्पतींबद्दलचा आदर आणि प्रेमभाव या माझ्या अनुभवातून माझ्यासमोर लख्खपणे स्पष्ट झाला होता..

 

सुश्री स्नेहा दामले

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print