मराठी साहित्य – विविधा ☆ शिशीर ☆ सौ. राधिका भांडारकर

☆  विविधा ☆ शिशीर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

माझ्या मते ऋतुचक्रातला शेवटचा, ऋतु म्हणजे शिशिर ऋतु!!

या वर्षी २१ डीसेंबरच्या मध्यरात्री पासून सुरु होऊन १७ फेब्रुवारी पर्यंत ढोबळ मानाने शिशीर ऋतुचा काल आहे.. थोडेसे या ऋतूविषयी…

असं मानलं जातं की,वसंत,ग्रीष्म आणि वर्षा हे देवींचे ऋतु तर शरद ,हेमंत,शिशीर हे पितरांचे ऋतु.काडाक्याची थंडी, कधी घनदाट धुके,धवल दिशा आणि ऊज्वल धरती हेच शिशीराचे रुप! जणु पृथ्वी आणि आकाश यांचे एकतत्व!!

भरपूर ऊर्जा देणारा ऋतु म्हणजे शिशीर ऋतु!! या कालात सूर्यकिरणांत अमृततत्व असते. आणि वनस्पती,फळं, भाज्या,या सर्वांमधे याच तत्वांचा समावेश झाल्यामुळे त्या अधिक स्वस्थ्यवर्धक बनतात.

शिशिर ऋतु म्हणजेच शीतऋतु. हलक्या गुलाबी थंडीचा हेमंत सरतो  आणि कडक थंडीच्या शिशिराची चाहुल लागते.या दिवसात गोड आणि स्निग्ध पदार्थांचा आहार योग्य मानला जातो. त्यामुळे या काळात येणारे सण, विशेषत: माघी गणेश जयंती, सोमवती अमावस्या, मकर संक्रांत साजरी करत असताना तीळ आणि गुळाचे सेवन हे फार महत्वाचे ठरते.

माघ आणि पौष महिन्यात तिळ—गुळाचे दान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. खरं म्हणजे आपले ऋतु आणि आपले सर्वच सण यांच्या केंद्रस्थानी धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचेच अधिष्ठान असते. शिवाय या संकेताच्या माध्यमातून संस्कृती,परंपरा जपण्याबरोबरच परस्परांमधले प्रेम,आपुलकी, जिव्हाळा, नात्यांची जपणूक, याचाही पाठपुरावा असतो.

“तिळगूळ घ्या अन् गोड बोला..” हा प्रेमाचा, वैरभाव दूर करण्याचा, एक महान संदेश शिशिर ऋतु देत असतो!!

खरं सांगायचं, म्हणजे सृष्टी आणि मानवी जीवन हे एकात्म आहेत. सृष्टी ,निसर्ग हा मानवाचा महान गुरु आहे. बदलते ऋतुचक्र हे मूळातच जीवन कसं असावं, जगण्याचे नियम कोणते याचीच शिकवण देते. ही शिकवण शरीराबरोबर मनही घडवत असते.मनावरच्या संस्कारासाठी हवा फक्त निसर्गाशी जाणीवपूर्वक संवाद!! जगतानाची डोळस दृष्टी!

शिशिर ऋतुला पतझड अथवा पानगळीचा ऋतु असेही संबोधिले जाते. कारण या ऋतूत शुष्कता वाढलेली असते.झाडांवरची पानं पिवळी पडुन ती गळून जातात .. म्हणून पानगळ!! पण यामागचा निसर्गाचा नियम समजून घेण्यासारखा आहे.पानाद्वारे जे पाण्याचे शोषण होते त्याला अवरोध करण्यासाठी ही पानगळ असते. धरतीचं यौवन राखण्याची ती धडपड… परिपूर्ण आयुष्यन जगल्यानंतर आनंदाने गळून जाणं आणि मातीत मिसळणं, आणि  नव्या पालवीला बहरु देणं हा सृष्टीचा नियम!!नियम पाळण्याची ही तटस्थता निसर्गाकडुनच शिकायला मिळते!

किती सुंदर संदेश! रात्रीच्या गर्भात उद्याचा उष:काल!!

जुनं जाऊद्या मरणालागुनी…।

विरक्ती म्हणजे निष्क्रियता नव्हे. निर्विकारताही नाही. आसक्तीविरहीत जगणं आणि मरणं म्हणजेच विरक्ती. या खर्‍या विरक्तीचं दर्शन शिशिर ऋतुतील ,सूर्याच्या ऊत्तरायण काळातल्या पानगळीच्या रुपानं होतं…. स्थित्यंतर हा निसर्गाचा स्थायी भाव!  आणि त्याची सकारात्मक स्वीकृती हा सृष्टीचा नियम!!थंडी, वारा, ऊन, पाऊस, आर्द्रता, शुष्कता , तेज,तम ही सारीच निसर्गाची रुपे! जी मानवाच्या जीवनाशी निगडीत आहेत… सहा ऋतुंची सहा रुपे! शिशिरात या ऋतुचक्राची समाप्ती होऊन नवा वसंत येतो! नवे चक्र. नवा बहर. मिटणं, गळणं तितकच महत्वाचं जितकं ऊमलणं, बहरणं.

अनुभवांची शिदोरी मागे ठेऊन एखाद्या वृद्धासारखा आनंदाने निरोप घेणारा, हा पानगळीचा शिशिर ऋतु मला वंदनीयच वाटतो!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्टील लाईफ – स्टील …. लाईफ इज देअर ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

☆ विविधा ☆ स्टील लाईफ – स्टील …. लाईफ इज देअर ☆ डॉ मेधा फणसळकर 

रोज सकाळी त्या रस्त्यावर लगबग चालू असायची. सकाळी पाच वाजताच मॉर्निंग वॉक घेणाऱ्यांची गडबड! हातातल्या काठ्यांनी रस्ता बडवत आणि तोंडाने  राजकारणावर चर्चा करत  जाणारे ज्येष्ठ नागरिक! मॅरेथॉन मध्ये भाग घेतल्यासारखे उत्साहाने धावणारे तरुण! पहिल्या एस. टी. साठी जाणाऱ्यांची तुरळक वर्दळ! “आयेगा आनेवाला$$$ आयेगा$$ “किंवा कधीतरी अचानक सकाळीच,” एक, दो, तीन ,चार…..” लावून माधुरीला आपल्या खिशातील मोबाईलमध्ये नाचवत जाणारे एक आजोबा! आपल्या घरातील कुत्र्यांना फिरवून आणण्यासाठी आणि त्या निमित्ताने स्वतःचा व्यायाम होईल या उद्देशाने फिरणारी मालक मंडळी! लांबूनच त्या कॉलनीतील गच्चीवरुन येणारा ओंकाराचा सामूहिक नाद! वर्तमानपत्र विक्रेत्यांची आलेले गठ्ठे वेगळे करण्यासाठी चाललेली धडपड!

नुकत्याच उघडलेल्या पेट्रोल पंपावर आलेले एखादे चुकार वाहन! आणि दूध, वर्तमानपत्रे टाकणाऱ्या त्या मुलाची वाजणारी सायकलची घंटी! तेवढ्यात येणारी स्कुलबस आणि उत्साहाने लवकर उठून तयारी करुन आलेले, आई- बाबांना टाटा करुन मित्र- मैत्रिणींच्या गराड्यात सामील होणारे ते युनिफॉर्ममधील चिमुरडे!  रस्त्यावरचे  येणाऱ्या – जाणाऱ्या नवीन वाटसरुना आपल्या हद्दीची जाणीव करुन देण्यासाठी गुरगुरु लागणारे श्वानपथक!   एखादा घाबरुन त्यांचा अंदाज घेत चालू लागणारा, तर एखादा मोठा आवाज काढून त्यांना हटकणारा!  तेव्हा शेपूट घालून माघारी वळणारे हेच पथक!

रोजचे जिवंतपणा आणणारे हे दृश्य हल्ली मात्र एकदम स्थिर झाल्यासारखे झाले आहे. ‛कोरोना’ संपूर्ण जगाला विळखा घालत या रस्त्यापर्यंत पोहोचला आहे.  त्यामुळेच एकाकी झालेला रस्ता रोजच्या वाटसरूंची वाट बघत थकतो आहे. सूर्य रोजच्यासारखाच पूर्वदिशेला रंगांची उधळण करत माथ्यावर येतो. पक्षी रोजचाच  किलबिलाट करतात. एखादा चुकार हॉर्नबील शेजारच्या नाल्यात  काहीतरी ढवळू लागतो. गाई- म्हशी रानात चरत असतात.  झाडांची सळसळ आपल्या जिवंतपणाची साक्ष देतात.  पण… पण आज त्या रस्त्याला जाग आणणारे मानवी जग मात्र काही काळासाठी गोठून गेले आहे. मानवाचा अव्याहत चालणाऱ्या गतीला आज एका सूक्ष्म जीवाने रोखले आहे. कुठूनशी येणारी वाऱ्याची मंद झुळूक पण आज या रस्त्यावरुन जाताना चाचपडत आहे. वाहनांच्या गजबजाटाने अव्याहत धुरळा उडवणारी धूळ आज जणू काही नतमस्तक होऊन रस्त्यावर सुस्त होऊन पडली आहे. वाऱ्याने उडणारा पाचोळा सतत टाळ्या वाजवून रस्त्याला जागे करण्याचा प्रयत्न करत आहे.ही भयाण शांतता मानवाच्या मर्यादेची जाणीव करुन देत आहे. जणू काही त्याला प्रश्न विचारत आहे,“ आज हरलास ना? हतबल झालास ना? किती गोष्टींवर तू जय मिळवला आहेस? तुला गर्व झाला होता ना की मी काहीही करु शकतो! आज उपग्रहसुद्धा माझ्या ताब्यात आहेत. मी अनेक तंत्र विकसित करुन मला हवे तसे सुख मिळवले आहे. मला फक्त पुढे जायचे आहे. नाती- गोती, भावभावना नगण्य आहेत त्याच्यापुढे! मला फक्त विकास आणि त्याने प्राप्त होणारे धन हवे आहे. मिळाले तुला पाहिजे ते? आज तुझ्या डोळ्यालाही न दिसणाऱ्या एका सूक्ष्म जीवाने तुझ्यावर मात केली आहे. तुला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले आहे. तुझी गती काही काळासाठी गोठवून ठेवली आहे. आता तरी जागा हो. या संकटातून जगशील – वाचशील तेव्हा नव्याने आयुष्य सुरु कर. लहानपणी वाल्या कोळ्याची गोष्ट ऐकली होतीस ना ? ‛तुझ्या पापाचा धनी फक्त तू एकटाच आहेस.’ हे लक्षात आल्यावर वाल्याचा वाल्मिकी व्हायला वेळ लागला नाही. त्यासाठी त्याला रामनामाचा जप करत अंतर्मनात डोकावावे लागले. तुला तेच करावे लागेल. आत्मपरीक्षण! असे सांगतात की पूर्वी खूप मोठा प्रलय झाला आणि सर्व जीवसृष्टी नष्ट झाली. त्यावेळी फक्त ‘मनू’ जिवंत राहिला आणि त्याचेच वंशज आम्ही मानव आहोत. आता गोष्ट खरी- खोटी हे जाणून घेण्यात मला स्वारस्य नाही. पण त्यातील आशय जास्त महत्वाचा! प्रलय प्रलय म्हणजे तरी काय? आत्ता जो हाहाकार माजला आहे ते त्याचेच रुप आहे. तुला त्यातून तरुन जायचे आहे, नव्याने घडी बसवायची आहे. त्यासाठीच आहे ही स्थानबद्धता! जागा हो!विचार कर आणि तुझ्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे हे कायम लक्षात ठेव. तरच ही गती पुन्हा सुरु होईल.”

माझ्या मनात कोरलेले हे चित्र ! अजूनही तिथेच गोठून राहिलेले… स्थिर चित्र… स्टीललाईफ…. बट स्टील देअर इज लाईफ….

 

 

©️ डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मन ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ विविधा ☆ मन ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

जे जे मनात भावे| ते ते इथे उतरावे|

मनमोकळे करून घ्यावे|आपले निसंकोच |

असं म्हणून मी पहिल्यांदा माझं मन कधी मारलं हे आठवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गोष्ट अट्टाहासाने पूर्ण करून घ्यायचा स्वभाव त्यामुळे हौस फिटेल हौस भागेल असं काहीसं करून मन भरून घेतल्याचा आठवलं.

असं केल्याने आज मन तृप्त आहे का? की हूरहूर आहे? हे शोधायचा प्रयत्न केला आणि कबीरांचा दोहा आठवला

गेली कामना चिंता सरली मनमुक्त असे सैराट |

ज्याला काहीच नको असतो तोच खरा सम्राट |

माझ्यासारख्या पामराला कुठेतरी माझ्यातला सम्राट जागा करायचा होता म्हणून सतत मनाची कामना पूर्ती कशी होईल हा अट्टाहास कमी व्हायला हवा हे जाणवलं आणि मन मारायची सवय लावायची असं ठरवलं.

माझ्या मनाचा ठाव घेऊ लागले.मी मनाच्या आरशात पाहू लागले. माझे विचार मांडायची ती जागाच आहे ना? मला त्यात माझं प्रतिबिंब दिसलं. माझं मन आरशासारखं चकचकीत कधी होईल? असा प्रश्न मी त्या प्रतिबिंबाला विचारला. त्याचे उत्तर मार्मिक होतं बाह्य कर्म हा मनाचा आरसा आहे. त्यासाठी सदैव प्रसन्नचित्त असले पाहिजे.

थोडक्यात काय….

मन करा रे प्रसन्न| सर्व सिद्धीचे कारण|

केवढा खजिना सापडला होता आज मला!!

मनाला लागली दूषणे मला त्याचा शोध घ्यायला भाग पाडू लागली ‘प्रसन्न’ या शब्दाचा गर्भितार्थ शोधण्यासाठी मी माझ्या मनाला भेटायचं ठरवलं……

आपुलाची वाद आपणासी या व्यवस्थेत असताना अचानक मी माझ्या मनात शिरले ती एका चोर वाटेने. थोडी आडवळणी असली तरी तिने मला दिशा दाखवली. थोडी गुंतागुंतीची असली तरी तिने माझ स्वागत केले. आणि मग माझं मन किती अवाढव्य आहे याचा मला अंदाज लागला.

उगाच नाही बहिणाबाईंनी मनाची व्याप्ती वर्णन करताना म्हटलयं ‘मन वढाय वढाय’

‘असं कसं मन असं कसं रे घडलं?

कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं?

अशी साशंकता त्यांनी वक्त केल्यावर मात्र मी माझ्या मनाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला.

मन हे बंद बाटलीतल्या राक्षसासारखा आहे. अफाट शक्ती असलेलं आणि बुद्धीवर ताबा नसलेलं! बुद्धीचा वापर करून ते बाटलीच्या बाहेर आलं तर ठीक… नाहीतर विस्फोट ठरलेला. बुद्धीचं तारतम्य असलेलं मन विधायक काम करत.

मन अनाकलनीय, गूढ, विविधरंगी, विविधढंगी असं आहे. हवी ती उपाधी त्याला द्यावी ते तसं दिसू लागतं. क्षणात हळवं क्षणात चौफेर उधळणारं, क्षणात एकटं, क्षणात क्रूर, क्षणात कपटी, क्षणात पवित्र…..

मन राजासारखा आहे म्हटलं तर ते तसंच रुबाबदार आणि बलदंड वाटू लागतं. मनस्वी आहे असं म्हटलं तर ते मस्तवाल वाटू लागतं. उन्मत्त आहे असं म्हटलं तर खरच ते कुणाचेही ऐकत नाही. प्रेमानं सांगितलेली गोष्ट ते साशंकतेने घेतं कोणीही कोणताही उपदेश केला तरी ते वळत नाही.

मनाचा वेगही अचाट! ते कधी तळ्यात तर कधी मळ्यात.

अचपळ मन माझे, नावरे आवरीता |

तुझं विण शिण होतो, धावरे धाव आता|

मनाचा वारू आवरायला भगवंताला पाचारण करावे लागले.

मन लोभी मन लालची मन लंपट मन चोर

मन के मतनाचे पलक पलक मनोर

असंही मनाला दूषण दिलेलं आहे.

मनाचं अस्तित्व हे माझ्या देहापासून वेगळं नाही. अशरीर असं मन अस्तित्वातच नाही त्याचा चेहरामोहरा मी पाहिलेला नसला तरीदेखील माझ्या अस्तित्वाचा धनी तोच आहे मला तो गूढ अनोळखी वाटत असला तरी माझा चेहरा हा माझ्या मनाचा आरसा आहे माझ्या जीवनात घडणाऱ्या मानसिक घटनांची मालिका म्हणजे माझं मन आहे.

माझ्या मनाचा लगाम माझ्याच हाती हवा.

कधी कधी मनाची मनमानी चालते तो मालक बनू पाहतो त्याच्यासारखे नाही वागले तर रुसत. आंधळ्या मनाबरोबर चालत राहील तर खड्डे अटळ आहे आपल्या मनाला डोळस केलं पाहिजे आपण त्यांचे गुलाम होऊन चालणार नाही कबीरांनी पुढे आपल्या दोह्यात म्हटलंच आहे.

मन के मते मत चलिये |मन जिया तिया ले जाये\

मन को ऐसा मारिये |मन टुकडा टुकडा हो जाये\

तात्पर्य काय तर माझ्या मनावर माझं नियंत्रण हवं नाहीतर माझी अवस्था अशी होईल की माझी न मी राहिले………

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ त्रिकूट…भाग 2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ मराठी साहित्य – विविधा ☆ त्रिकूट…भाग – 2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

तारीख 29 ऑक्टोबर सकाळी काळूराम बोका घरात आला तो लंगडतच. मागच्या उजव्या पायाचा तळवा चांगलाच सुजला होता. पायाला कोणालाही हात लावू देत नव्हता. खाणंपिणं झालं आणि पुन्हा रात्री जो बाहेर गेला तो चार दिवसांनीच परत आला. चार दिवसात ती सूज आणखी वाढली होती. घरात तो उपचार करू देणे शक्य नव्हतं. जनावरांचा दवाखाना जवळच असल्याने बास्केट मधून त्याला दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी भराभर इंजेक्शन दिली. दुसरे दिवशी पुन्हा चार इंजेक्शन्स झाली. शूज थोडी कमी झाली पण पाय टेकता येत नव्हता. पंजा पूर्ण लाकडासारखा कडक आणि निर्जीव झाला होता. पाय सारखा झाडत होता. नंतर विजयनगरच्या डॉक्टर ढोके ना दाखवून आणलं. रक्त कुठं पर्यंत पोचतय हे पाहण्यासाठी छोट अपरेशन केलं. पायाला बांधलेलं बँडज रहात नव्हत. दोन दिवसांनी पुन्हा दाखवायला नेल. पायात किडे होऊन गॅंगरीन झालं होत. डॉक्टरांनी दोन पर्याय सांगितले. जीव वाचवायचा असेल तर पाय मांडीपासून काढावा लागेल. 100% याला साप चावलेला आहे. त्याशिवाय अस होणार नाही. दुसरे दिवशी मोठं ऑपरेशन झालं. त्याची भूल उतरली आणि काही वेळातच खायला लागला. तीन पायावर घरात हिंडत काय पण चांगला पळत होता. आठ-दहा दिवस त्याला खूप जपायला हव  होतं. जखम चाटू द्यायची नव्हती. रोज रात्री घरातले सगळेजण आळीपाळीने जागत होतो. त्याचा तोकडा पाय बघवत नव्हता.

सगळं ठीक होत , तोपर्यंत जखमेवर घातलेले टाके त्याने काढून टाकले. पुन्हा दवाखाना पुन्हा टाके आता त्याचे हाल बघवत नव्हते. दुधातून गोळ्या अँटिबायोटिक औषधे देत होतो. खाण्यापिण्याचे तक्रार नव्हती. 21 नोव्हेंबरला दुसऱ्यांदा घातलेले टाकेही पुन्हा निघाले. जखम पूर्ण उघडी झाली. औषधे तर चालूच आहेत. आता पक्क ठरवलं की तो खातोय पितोय घरात फिरतोय फक्त बाहेर हिंडायला जाता येत नाही. तेव्हा आता दवाखाना टाके इंजेक्शन काहीही विचार करायचा नाही. त्याचे हाल करायचे नाहीत. हळूहळू जखम भरून येईल. कितीही दिवस लागू देत ,पण आता काहीही नको. त्याची घरात सगळी व्यवस्था केलेली आहे. त्याला सारखे बाहेर जायचे असते.पण बाहेर कसे सोडणार? काळूराम सावकाश का होईना बरा होऊन बाहेर जायला लागू दे. शेवटी तो निशाचर प्राणी आहे ना! लवकर बरा होऊ दे अशी प्रार्थना करुया.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता.

मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ त्रिकूट…भाग 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ विविधा ☆ त्रिकूट…भाग 1 ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

मी एक प्राणी प्रेमी. त्यातही थोडी अधिकच मार्जार प्रेमी. घरात मांजर नाही असं कधीच झालं नाही. आता सध्या आमच्याकडे तीन मांजर (आमची मुलं) आहेत. सुंदरी आणि तिची मुलगी टिल्ली या दोन मुली आणि काळूराम हा बोका. मुलगी सुंदरी आता आजी पण झाली. दोघींचीही आता कुटुंब नियोजनाची ऑपरेशन झाली आहेत.

सुंदरी नावाप्रमाणे दिसायला खूपच सुंदर अगदी दृष्ट लागावी अशी. जणू रंभा उर्वशी अप्सरांच सौंदर्य. अंगाने गुबगुबीत, भरपूर सुळसुळीत केस, जाड आणि डौलदार शेपूट, पिवळा पांढरा सगळे रंग तिच्यामध्ये मिसळलेले अशी ती मोठी झालेली कुठून तरी आली. सगळ्यांनाच आवडली. लळा लावलान आणि  आमचीच झाली. स्वभावाने तर अतिशय गरीब. कधी कोणाला चावणार नाही, तर कधी रात्रभर बाहेर असलेलं दूध सांडणार नाही.ओरडण्याचा आवाज सुद्धा अगदी मृदू आणि हळुवार. एखाद्या सोज्वळ आणि शांत मुलीसारखा.खरी भूक लागली असेल तरच घातलेलं दूध पिणार.नाहीतर वास घेऊन निघून जाणार. कॅटफूड मात्र आवडीने खाणार. दुसऱ्याच्या  उष्ट्या ताटलीत घातलेलं आवडत नाही. वेगळ्या ताटलीत घालायला हव. तिघांच्या मिळून सात ताटल्या आहेत. तिला काहीही नको असलं तरी ह्यांच्या मागोमाग इतकी करत रहाते की जणू ह्यांची ती बॉडीगार्ड किंवा पाठराखीणच आहे की काय असं वाटावं कोणाच्याही मांडीवर बसायला तिला फार आवडतं.

तिची मुलगी टिल्ली. .दिसायला अगदी आईसारखे रंग. पण आई सुंदरी जास्तच रुपवान. टिल्लीला पहिल्यांदाच गोजिरवाणी तीन पिल्ल झाली. खूपच लहान वयात आई झाली. पण आईची जबाबदारी छान पार पाडलीन तिनं. पिल्ल चांगल्या घरी गेली.  टिल्ली म्हणजे जरा जास्तच  आढ्यतेची. तिला शिळं दूध आवडत नाही. ताज हवं. .त्यातही वारणा दूध असेल तर एकदम खुश. भूक नसताना गवळ्याच दूध दिल तर वास घेऊन मानेला हिसका देऊन नाक मुरडून निघून जाते. झोपायलाही छान माऊ गाडी लागते. दिवसातला बराच वेळ गच्चीमध्ये कुत्र्यांबरोबर निवांत असते. टेबल टेनिसच्या  बाल बरोबर आईशी खेळते. कधी आम्हीही तिच्याशी खेळत बसतो. तिला एकटीला खेळायला फारसे आवडत नाही. पण उचलून मांडीवर खांद्यावर घेतलेलेही तिला आवडत नाही.   एखादं घरातलं शेंडेफळ कसं लाडात लाडात असतं  ना, अगदी तशीच सगळ्यांशी लाडलाड करत असते. मी तर तिला नेहमी म्हणते, (किती नाटकं करतीस ग मागच्या जन्मी कुणी राणी कि  राजकन्या होतीस का ग?” मी तर हिरोईनच म्हणते तिला.

काळूराम बोका शुभ्र पांढरा आणि कुट्ट काळा असे दोनच रंग आहेत त्याच्यात.नाकावर डार्क काळ्या रंगाचा मोठा ठिपका असल्यामुळे तो अगदी विदूषक का सारखा दिसतो. बोका म्हणून अंगात रग जरा जास्तच.साडेचार वर्षाच वय,तारुण्यातली मस्ती अंगात मुसमुसलेली, एखाद्या उनाड मुलासारखा. बाहेर गेला की कधीकधी दोन-तीन दिवसांनी ही परत येतो. येतो तो मित्रमंडळान बरोबर मारामाऱ्या करुनच येतो. आणि मग कुठेतरी पायाला लागलेलं असतं. नाक सुजलेला असत.  मग आम्ही औषधोपचार करायचे. अस चालत हे सगळं.त्याची खाण्यापिण्याची आढ्यता, तक्रार नाही. फक्त जे खायचं ते भरपूर हव. दूध पोळी कॅटफूड व्हिसकस या सगळ्या बरोबर श्रीखंड तर त्याला फारच आवडतं बोका म्हणून उगीचच दोघींवर दादागिरी करत असतो. सुंदरीला कारण नसताना घराबाहेर हाकलत राहतो.थोड्या वेळानंतर लगेच परत येते बिचारी.तो मात्र आमच्याकडून रागावून घेतो.सकाळी सात साडेसात पर्यंत  एकानंतर एक असे तिघेही येतात. त्रिकूट तयार होत.सकाळी घरातले सगळेजण उठले की कोणाला दूध दिल, कोणाला खायला दिलं कोणाला  दिलं नाही अशी चर्चा सुरू होते.

या त्रिकुटा बरोबर रहाताना खरोखरच कुठलेही ताणतणाव,काळज्या,या सगळ्यांपासून आपण दूर जातो. म्हणतात ते खरंच आहे “घरात पाळीवप्राणी असले की रक्तदाबाचा बीपीचा त्रास होत नाही”. जे

सध्या काळूराम प्रकृती  अस्वास्थ्यामुळे बेचैन आहे ते पुढील लेखात.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझी रेसिपी मला परत…☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ माझी रेसिपी मला परत… ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

रविवारची ‘टवाळखोरी’ ?

माझी रेसीपी मलाच फाॅर्वर्ड झालीय..

मंडळी नमस्कार ?

तुमच्या पैकी अनेकांनी वरचे वाक्य असलेली जहिरात पाहिली असेल.

आपण  लिहून पाठवलेली एक रेसिपी व्हायरल होऊन परत आपल्याला कडे येते, हे जिला सर्वप्रथम ही रेसिपी पाठवली तिला सांगताना काकूंना होणारा आनंद अगदी त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय.

असा अनुभव आज अगदी कुणालाही येऊ शकतो. सध्याच्या ‘सोशल युगात’ तत्पर फिडबॅक मिळण्याचा एक नवीन प्रकार आहे हा असं मला वाटते.

आज एखादी नवीन माहिती,  नविन विचार, विनोद, मिम्स,राजकीय विश्लेषण, संदर्भ, कला, लेख, एखादे गाणे  सोशल मिडीयावर शेअर केले जाते. त्यातील आवडलेली माहिती/ पोस्ट  पुढे ढकलली जाते ( कधी मुळ कर्त्याचे नाव ठेऊन/ काढून/बदलून).  आणि अशाप्रकारे आपण त्या पोस्ट कर्त्याचे एक प्रकारे कौतुकच करतो.

पूर्वी लेखन हे प्रामुख्याने पुस्तक/ कादंबरी रुपात वाचायला मिळायचे. वाचनालय ही हक्काची ठिकाणे असायची. दिवाळी अंक/ पाक्षिक / मासिक यातून ही अनेक लेखक भेटायचे. त्यानंतर अनेकजण  रविवारच्या वृत्तपत्र  पुरवण्यातून भेटावयास येऊ लागले. इंटरनेट माध्यमातून मात्र लेखक/ वाचक यांच्यातील अंतर कमी झाले. प्रत्यक्ष भेटून अभिप्राय देता नाही आला तरी विविध संकेतस्थळे, त्यांचे ब्लाॅग, यूट्यूब चँनेल्स आणि आता व्हाटसप/फेसबुक पेज इ माध्यमातून हे सगळे कलाकार प्रत्येकाच्या अगदी खूप जवळ आलेत. त्यांना प्रतिक्रिया देणे ही सोपे झाले आहे.

याच माध्यमामुळे अनेक वेगवेगळे लेखक/ कलाकारांची माहिती झाली. छापील माध्यमातून पेक्षा  आँनलाईन लेखक म्हणून अनेकांना ओळख मिळाली, अनेकजण प्रसिद्ध झाले.  आणि जेंव्हा अशी त्यांची निर्मिती / रेसिपी  जेंव्हा त्यांची त्यांनाच परत फॅर्वर्ड होऊन परत येऊ लागली ती त्यांच्या त्या लेखनाची यशाची पावतीच म्हणावी लागेल.

माणूस जसं प्रारब्ध घेऊन येतो तसे काही लेख/ कथा / विनोद/ मीम्स / कलाकृती या ही प्रारब्ध घेऊन येतात. कुणाच्या नशिबात केंव्हा ‘व्हायरल’ व्हायचा योग येईल हे त्या कर्त्याला ही सांगता येणार नाही.

माझ्या सुदैवाने गेल्या १०-१२ वर्षात काही लेख याबाबतीत सुदैवी ठरले मग तो ‘भाईं’ वरचा लेख असेल किंवा संकष्टीच्या आधी ‘ साबुदाणा भिजवण्याचा ‘ निरोप असेल किंवा मग ‘ शेपटीवाल्या प्राण्यांचे ‘ विडंबन गीत असेल.

अगदी त्या काकूंना झालेला आनंद प्रत्यक्ष अनुभवलाय. मीच नाही तर अगदी अनेकांनी.

तेंव्हा ‘रेसिपी’ बनवत रहा.

मंडळी थोडंसं तत्वज्ञान सांगून माझी टवाळखोरी थांबवतोय.

” माझी रेसीपी म्हणजे माझे कर्म ( नेहमी)  मलाच फाॅर्वर्ड होत असते ”

समझनेवालों को….

 

©  श्री अमोल अनंत केळकर

०६/१२/२०२०

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शब्दांच्या पलीकडले ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी 

☆ विविधा ☆ शब्दांच्या पलीकडले ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

सुरेल आवाजाची निसर्गदत्त देणगी असलेल्या सुमन कल्याणपुर यांचे ‘शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी ‘हे गाणं माझं अगदी फेवरेट! ते ऐकताना गाण्यातला एक विषण्ण भाव त्या नाजूक सुरातून माझ्या मनात डोकावला. अर्थातच माझं मन माझ्याशी हितगूज करायला लागलं. या गाण्यातील शब्दांना म्हणजे त्या बकुळीच्या नाजूक फुलांना कुठे साठवू कसे जपू असं झालं मला……

कुठेतरी असही वाटलं की या शब्दांची सुंदर लेणी तयार झाली तर ती डोळ्यात साठवता येतील. या शब्द रुपी कमळाच्या भावविश्वात माझ्या मनाचा भुंगा रुंजी घालू लागला आणि मकरंद चाखू लागला. माझं शब्दांवर प्रेम जडलं. मी शब्द वेचू लागले.

शब्दांचे बुडबुडे माझ्या भावविश्वात तरंगायला लागले आणि माझ्या विचाराच्या लोलकातून परावर्तित होऊन माझ्याच कोऱ्या मनावर एक इंद्रधनुष्य उमटलं अर्थातच माझा मन मोर पिसारा फुलवून नाचू लागला

अडीच अध्याक्षरा पासून तयार झालेला हा शब्द! याचं वर्णन शब्दातीत आहे!! शब्द शब्द जोडून त्याचे वाक्य, वाक्यांच्या सरी गुंफून लेख, अनेक लेख एकत्र येऊन ग्रंथ, ग्रंथांच्या भांडारामुळे ज्ञान आणि ज्ञान हाच आपला खरा श्वास! श्वास हेच जीवन ,जीवन हेच अस्तित्व आणि अस्तित्व हाच सन्मान म्हणून शब्दाचा सन्मान केलाच पाहिजे.

संत तुकाराम महाराजांचा आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने हा भीमसेन जोशी यांनी गायलेला अभंग शब्दरूप रत्नांचा सन्मान करतो.

शब्दाचा ध्वनी कानात शिरला की भावविश्वात भावतरंग निर्माण होतात आणि मन डोलायला लागतं. सुंदर शब्द पेरलेली गाणी हे त्याचे जिवंत उदाहरण….

शब्द शब्द जुळवुनी वाचिते तुझ्या मना

आवरू किती गडे मी या लोचना

शब्द सौंदर्यानेच तर अशा कविता सजतात आणि पदन्यास घालतात.

शब्द हे एक प्रकारचं रसना चाळवणारं भोजन आहे .ते कसं वाढायचं हे सुगरणीच्या हातात असतं. जेवणात खडा आला की कसं अन्नावरची वासना जाते ना तसंच काहीसं संवादात काटेरी शब्द मन दुखावतात. गोड जेवण जसे मन तृप्त करते तसेच चार गोड शब्द हे खारीच्या पाठीवरून प्रेमाने फिरवलेल्या हाताच्या बोटा सारखे हळुवार असतात.

शब्दांना एक गंध असतो सुवासिक फुलांसारखा !लेखकाच्या लेखणीतून श्वासागणिक एकेक शब्द कागदावर उतरतो जसा काही फुलांचा सडा… वेगवेगळ्या रंगरूपात त्यांचं साहित्य फुलतं अगदी सुरेख सुवासिक फुलांसारखं आणि आपलं मन त्यांच्या भोवती रुंजी घालत.

शब्द इतिहास घडवतो.पेशवाईत आनंदीबाईनी ध चा मा केला हे सर्वश्रुतच आहे.’ लक्ष्मण रेषा’ या शब्दाने रामायण घडले. गैरसमजाच्या साथीचा रोग या शब्दांनीच पसरवलाय असे म्हणावे लागेल. राजकारणातही रोज एक नवीन गैरसमज ही शब्दांचीच खेळी करते आहे.घडलयं बिघडलयं हे आवर्तन सतत शब्द घडवतात.

मुद्राराक्षसाचे विनोद शब्दांच्या फेरफारीने घडतात. उदाहरणार्थ वृत्तपत्रांमध्ये पत्रकारांना असे छापायचे होते की, मंत्री महोदयांना बरे नसल्यामुळे ते गाढ झोपले होते परंतु मुद्राराक्षसामुळे झालेला विनोद असा की मंत्रिमहोदयांना बरे नसल्यामुळे ते गाढव झोपले होते. दोन शब्दात आलेल्या व या शब्दाने अर्थाचा अनर्थ केला.

शब्दांच्या काना मात्रा यामधील मधील फरकामुळे मारू चे मरू असे होते आणि वाक्याचे अर्थ बदलतात शिर आणि शीर या शब्दांचेही असेच…… दोन वेगवेगळ्या शब्दांमध्ये एक शब्द आला तरी अर्थ बदलतो उदाहरणार्थ.. बायको आणि प्रियकर या दोन शब्दांमध्ये चा हा शब्द आला तर बायकोचा प्रियकर असा अनर्थ ओढवतो.

एकाच अर्थाचे दोन शब्द एकमेकांशेजारी आल्यासही गम्मत घडते .हाडांचा अस्थिपिंजरा, पिवळ पितांबर, काळी चंद्रकळा वगैरे वगैरे

शब्दालाही पाण्यासारखा रंग आहे तो ज्या प्रकारच्या लेखनामध्ये वावरतो त्या प्रकारचं सौंदर्य त्याला मिळतं .पाण्या तुझा रंग कसा असा प्रश्न जसा आपण पाण्याला विचारतो तसेच शब्दाला विचारला तरी त्याचे हेच उत्तर मिळेल.

शब्द जादूगार आहेत म्हणूनच अनाकलनीय असे साहित्य, गाणी जन्माला येतात. शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले या ओळीत अभिप्रेत असलेल्या शब्दांच्या पलीकडे हे शब्द घेऊन जातात. आणि मौनाचे भाषांतर होते.

शब्दाने शब्द वाढतो. त्याचे पर्यावसान गैरसमज आणि भांडण्यात होते. मनं दुखावली जातात पण गंमत अशी आहे की पुन:मैत्रीचे आव्हानही शब्द स्वीकारतात अशा वेळी शब्द एखाद्या कुलुपाच्या किल्ली सारखे काम करतात किल्ली सुलटी फिरवून मनं मोकळी करतात आणि किल्ली उलटी फिरवून गप, चूप, कट, पुरे असे शब्द तोंड बंद ही करतात. प्रेमळ शब्दांचे दोन थेंब कलह रुपी पोलिओ नष्ट करतात.

अहंकार, अबोला ही शब्दवस्त्रे उतरवून आपुलकी, आनंद ही शब्द वस्त्रे ल्याली तर परमानंद होतो तो निराळाच!

शब्दाचा शोध घेतला तर अनेक अर्थ निघतात.शब्द झेलणे, शब्द जोडणे, शब्दाबाहेर नसणे, शब्द पडू न देणे ,शब्द देणे, शब्दाचं पक्कं असणे ,शब्दाचा बाण ,शब्द संस्कार या आणि अशा अनेक वाक्प्रयोगातून ते शोधता येतात.

शब्दांच्या मोत्यांचा सर संवादाचा हार बनतो. त्या हाराचे पावित्र्य पुन्हा शब्दांचा सन्मान करतात.

अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी

शब्द जुळवुनी घट्ट करू नात्यांच्या गाठी

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सौभाग्यवती भव ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ विविधा ☆ सौभाग्यवती भव ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

आज सकाळी सकाळी शिल्पाचा फोन आला. “काकू, ई अभिव्यक्ति वरचे माझे लिखाण वाचून एका आजींचा फोन आला होता. त्यांच्या आवाजावरून, बोलण्याच्या स्टाईल वरून आजी वाटल्या मला त्या. माझ्या लिखाणाचे कौतुक केले त्यांनी. आवडले म्हणाल्या.”

“अरे वा! छानच आहे मग. अभिनंदन, तुझा लढा पटतोय ना खूप जणांना”. मी म्हणाले.

“पण फोन ठेवताना मला आशिर्वाद देत म्हणाल्या, ” असेच सांगत जा आम्हाला. खूप मोठी हो. सौभाग्यवती हो!”. शिल्पा म्हणाली.

“चांगले आहे ना. छान आशीर्वाद मिळाला. उत्साह वाढेल तुझा.”

“काकू,!लग्न झालेल्यांना भाग्यवती म्हणतात ना आपल्याकडे. मग मी कशी काय?” जरा पडेल आवाजात शिल्पा म्हणाली.

“अगं, तसंच काही नाही. ती एक प्रथा आहे. तुला त्या आजी तसं म्हणाल्या कारण ई  अभिव्यक्तिवर व्यक्त होण्याचे भाग्य तुला लाभलेआहेच. ते सौ पटीने वाढू दे, असा आशीर्वाद दिला त्यांनी तुला. शिल्पा, खरे सौभाग्य म्हणजे ज्याला जे येतं, आवडतं ते करायला मिळणं म्हणजे खरं भाग्य! आणखी एक सांगते, आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी माता आहेत, ज्यांनी आपल्या एकटीच्या बळावर मुलांना मोठं केलं. सुसंस्कारित केलं. चांगले शिकून आपल्या पायावर उभं केलं.त्या सगळ्या माऊली सौभाग्यवती!सौभाग्यवती हे आदराने मान झुक विण्यासाठी म्हटलं जातं .तो एक मान आहे असं समज .त्या आजींनी एक प्रकारे तुझा गौरवच केलाय. तुझ्या साहित्याला केलेला मुजराच आहे. तुझ्या ज्ञानाचा,लिखाणाचा गौरवच आहे.”

खरोखर शिल्पा, अशा ग्रुपमध्ये तुझे विचार मांडायला मिळत आहेत हे खरंच तुझं भाग्य आहे. माझ्याही सदिच्छा सतत तुझ्या बरोबर आहेत. शिल्पा, तू सौभाग्यवती आहेसच. अशीच खूप खूप मोठी हो!तुझ्या ज्ञानाच्या प्रकाशाने सर्वांना दिपवून टाक.काव्य गंधाने सर्वांना मुग्ध कर. तुला तुझ्या मनातले विचार व्यक्त मिळोत. तुझे घुंगरा चे पदन्यास पहायला सर्वांना ते भाग्य लाभो. तुझ्या वक्तृत्वाची धार सर्वांना ऐकायला मिळो आणि तुझे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे “जयोस्तुते” पहाण्याचे महद भाग्य सर्व वाचकांना, श्रोत्यांना आणि ईअभिव्यक्तीच्या संयोजकांना लाभो. खास या सर्वांसाठी आपण एक कार्यक्रम आयोजित करू.कोरोना चे संकट, सावट दूर झाले  की खरंच आपण “शिल्पोत्सव” साजरा करू.

 

© सौ.अंजली दिलिप गोखले

मिरज

फोन नंबर ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लाखेचे उपयोग (भाग ४) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

☆ विविधा ☆ लाखेचे उपयोग (भाग ४) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

लाखेचे उपयोग एवढे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत की थक्क व्हायला होतं. हैद्राबादच्या प्रसिद्ध लाखेच्या बांगड्या या समस्त स्त्री वर्गाच्या आकर्षणाचा विषय आहेत. याच बरोबर दागिने, पेन, खेळणी बनवण्याकरता लाख वापरतात.

परंतु, लाखेचा उपयोग मुख्यत्वे सील करण्यासाठी होतो. मोठं मोठ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सीलबंद करुन परीक्षाकेंद्रांवर पाठवल्या जातात. सरकारी कागदपत्रं, तिजोर्‍या या ही सीलबंद केलेल्या असतात. सरकारी लखोट्यांवर जो लाल शेंदरी रंगाचा मोठा ठिपक्या सारखा आकार दिसतो, तो दुसरं तिसरं काही नसून लाखच असते.

लाख विद्युत निरोधक म्हणूनही वापरतात.

मुद्रणाची शाई तयार करण्यासाठी लाखेचा उपयोग होतो.

लाकडाचं पॉलिश, व्हार्निश करण्यासाठी लाख उपयोगी आहे.

चामडे आणि जोडे यांच्यावरील  संस्करण लाखेनं केलं जाते.

लाकूड, धातू, आणि अन्य पृष्ठभागावरील नक्षीकाम  करण्यासाठी हिचा वापर तर सर्वपरिचित आहे.

इ.स.१९५० पर्यंत शेलॅकचा वापर ग्रामोफोनच्या तबकड्या बनवण्याकरता होत असे.

पातळ व टिकाऊ थर बनू शकेल अशी  जलीय व्हार्निशे तयार करण्यासाठी लाख वापरली जाते.

फर्निचर, वाद्यं, क्रिडासाहित्य आणि खेळणी यांच्या पृष्ठभागावर लावण्यासाठी तसेच धातूच्या आणि लाकडाच्या पृष्ठभागावरील चिरा आणि फटी बुजवण्यासाठी स्पिरिट व्हार्निशांचा उपयोग करतात.

कागद आणि धातूंची भांडी, पोटात घ्यायच्या औषधी गोळ्या यांच्यावर थर देण्यासाठी देखील स्पिरीट व्हार्निश वापरतात.

मानवशास्त्रीय तसेच प्राणीवैज्ञानिक नमुने यांना संरक्षक लेप देण्यासाठीही स्पिरीट व्हार्निश वापरलं जातं.

रबरी कापड, मेण कापड इतकच नाही तर आपल्या घरातील फ्लोअर आकर्षक करण्यासाठी अंथरले जाणारं लिनोनियम यांच्या अंत्यरुपणासाठी स्पिरीट व्हार्निशच वापरतात.

डोक्यावर ठेवण्यात येणारी साहेबी थाटाची हॅट कडक बनवणं, मातीच्या भांड्यांना ती

भाजण्यापूर्वी लेप देणं यासाठी लाखच लागते .

रुपांतरीत शेलॅकवर आधारित, चांगली लवचिकता आणि रसायनांना प्रतिरोधक असलेले पॉलियुरेथिन लेपही विकसित करण्यांत आले आहेत.

तुमच्या घरातील शिशवी पलंगाचे पाय, आजोबांची काठी, दिव्यांचे स्टॅंड लाखेच्या करामती  मुळेच आकर्षक बनतात.

सील तयार करण्यासाठी राळ, केओलिन, रंगद्रव्य इत्यादींचे शेलॅक( झाडांच्या फांद्यांवरील लाख गोळा करून धुतल्या नंतर मिळणाऱ्या लाखेला शेलॅक म्हणतात.) बरोबर  मिश्रण  करतात.

उच्च विद्युत रोध, उच्च विद्युत दाबाचे विसर्जन झाल्यास संवाहक मार्गाचे प्रसारण होणे, इतर पदार्थांना चिकटणे या गुणधर्मांमुळे शेलॅकचे विद्युत उद्योगात अनेक  उपयोग आहेत.

विद्युत निरोधक, लाइटचे स्वीचेस, त्यांचे फलक, मुठी, विद्युत ठिणगी संरक्षक आवरणे ही यादी मारुतीच्या शेपटी सारखीच लांबलचक आहे.

रेडिओतील निर्वात नलिका, विद्युत दिव्यांच्या टोप्या यासाठी सुद्धा लाखच लाखमोलाची.

याशिवाय  धातू आणि  काच परस्परांना चिकटवण्यास बंधक द्रव्य म्हणून  लाखेचीच बात.

भारतात  सोन्या चांदीच्या  पोकळ दागिने भरण्यासाठी, बांगड्या बनवण्याकरता लाखच भरली जाते आणि तो  दागिना शब्दशः  लाखमोलाचा  बनतो.

आयुर्वेद म्हणजे  सध्या  लोकमान्यता  मिळालेले देशी वैद्यक शास्त्रात काडी लाख  पोटात घेण्याचं  औषध  म्हणून  देतात.

आहे  ना लाख मोलाची गोष्ट ! पण बरं का, समस्त  भारतीयांसाठी ही लाख केवळ लाख मोलाची नाही तर;  अत्यंत  अभिमानाची लाखातील बात अशी  की ;  या बहुउपयोगी लाखेचे जगाच्या  ऐंशी टक्के  उत्पादन  आपल्या  भारतात  होते . त्यामुळं  भारताला परदेशी  चलन मिळते. काय, झाली ना मान ताठ? मग करा बरं प्रतिज्ञा  भारतातील वनसंपदा टिकवण्याची, वृद्धिंगत  करण्याची!!

जय हिंद!!

संकलन व लेखन

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लाखेच्या  किड्याचे जीवनचक्र (भाग ३) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

☆ विविधा ☆ लाखेच्या  किड्याचे जीवनचक्र (भाग २) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

लाखेच्या अळीची कोष्ठावरणात वाढ होतच असते. कोष्ठावरण म्हणजे लाखेच्या अळीने स्वत:चा स्त्राव स्त्रवून स्वत: भोवती तयार केलेलं आवरण. ती मोठी  होईल  तसतसे कोष्ठाचे आकारमान वाढत जाते. प्रौढ दशा येईपर्यंत  अळी तीन वेळा  कात टाकते. अळी अवस्थेतील या तीन अवस्थांचा  काळ हा तापमान, आद्रता तसेच आश्रयी वनस्पती यांवर  अवलंबून  असतो. या काळात  किड्याचे लिंगही ओळखता  येते. हा लिंगभेद  पहिली कात टाकल्यावर  जास्त  ठळकपणे  दिसतो.

नर अळीचा लाक्षाकोष्ठ सपाता किंवा  खडावा  सारखा  असतो. दुसर्‍यांदा  कात  टाकल्यावर  लगेचच  मागच्या टोकाला  झाकणासारखी वाढ दिसू  लागते. यामुळे मागील टोक चादरीसारख्या आच्छादनाने झाकले जाते. पहिली कात टाकण्यापूर्वीची अवस्था  म्हणजे  पूर्व कोशावस्था आणि  दुसरी  कात  टाकण्यापूर्वीची अवस्था  म्हणजे  कोशावस्था.या अवस्थांमध्ये अळी काही  खात  नाही. कोशावस्था पूर्ण  झाल्यावर पंखहीन अथवा सपंख नर बाहेर  पडतात. मागील टोकाकडील चादरी सारखं आवरण बाजूला  रेटून  त्या बाहेर  येतात. यात पंखहीन नर संख्येने जास्त  असतात. नर लाख किड्याचे आयुष्य  केवळ  बासष्ट ते ब्याण्णव  तासच असते.

मादी  डिंभ फुगीर ; नासपतीच्या फळासारखा किंवा  गोल पिशवी  सारख्या  आकाराचा असतो. तिसर्‍यांदा  कात टाकल्यावर  मादी  लैंगिकदृष्ट्या प्रौढ  बनते. अशा मागील टोकाकडील चादरी सारखं आवरण बाजूला सारून बाहेर  पडलेल्या  मादीचा नराशी संयोग होतो.यासाठी  नर लाख  किडा  मादी  लाख  किड्याच्या कोष्ठात  शिरतो  आणि  मादीच्या  शरीरात  शुक्राणू सोडतो. मात्र  लाख स्त्रवण्याची क्रिया मादी  अजूनही  चालूच  ठेवते. किड्याच्या आकारमानाबरोबरच लाक्षाकोष्ठही झपाट्यानं  वाढत जातो. मादीचा लाक्षाकोष्ठ नराच्या  लाक्षाकोष्ठापेक्षा अनेक  पटींनी  मोठा  असतो. अंडी  घालून  होईपर्यंत  मादी  लाख स्त्रवत असते. अफलित मादीसुध्दा फलित मादी सारखीच  लाख स्त्रवते तसेच  जननक्षम  प्रजा  देखील  निर्माण  करु शकते.

अंडी  अजून  मादीच्या  अंडाशयात  असतानाच  त्यांची  वाढ होऊ लागते. ही अंडी मादी लाक्षाकोष्ठातील विशिष्ट  कप्प्यांत घातली  जातात. या कप्प्यांमध्येच अंडी  ऊबवली जातात. अंडी  ऊबवल्यानंतर अंड्यातून  अळी  बाहेर  पडते. याच अळीला डिंभ म्हणूनही  ओळखतात. डिंभ झाडाच्या  कोवळ्या  फांद्याकडं कूच करतात.तिथं  आपली  सोंड  आत खुपसून  स्थिरावतात  आणि  पुढील  जीवनचक्र  सुरु राहते.

 

संकलन व लेखन

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares