मराठी साहित्य – विविधा ☆ स्वातंत्र्य ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ. मेधा फणसळकर

☆ विविधा ☆ स्वातंत्र्य ☆ डॉ मेधा फणसळकर 

आज ठरवलच आहे मी स्वतंत्र होणार! किती दिवस हे सगळे सहन करु? पण मी स्वतंत्र झाले तर माझे हे दोन बछडे राहतील माझ्याशिवाय? पण बाबा आहेच की त्यांची काळजी घ्यायला. त्यालाही कळू दे आपली जबाबदारी! इतके दिवस मीच सांभाळत आलीय सगळे. घर- दार- सासू- सासरे- पै पाहुणे मीच ओढत होते रामरगाडा! त्याची किंमत तर नाहीच, पण आपल्याला घरच्या कामवाल्या बाईपेक्षाही कमी किंमत दिली जातीय! व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य या सगळ्या बेगडी कल्पना आहेत. लग्नापूर्वी याच कल्पना किती पोटतिडकीने मांडत मी अनेक वक्तृत्व- वादविवाद स्पर्धा गाजवल्या. तीच मी आज माझ्याच स्वातंत्र्यासाठी झगडतेय.पण आज ठरवलंय मुक्त व्हायचे ! तुटतंय जरा पोटात पिल्लांचा विचार करुन! पण शिकतील तीही कधीतरी स्वतंत्रपणे जगायला! मी मात्र पक्क ठरवलंय आज स्वतंत्र, मुक्त व्हायचे या पाशातून …….

आशिष

जमणार आहे का मला तो NEET चा अभ्यास करणे? नाही आवडत मला तो biology विषय! समोर घेतलाच की झोप यायला लागते. पण तो सोडून मला नाही चालणार! आमचे पूर्ण घराणे डॉक्टरांचे! मग परंपरा कशी मोडायची? मला मेडिकललाच जावे लागणार असे पप्पांनी निक्षून सांगितले आहे. मम्मीचा पण तोच आग्रह आहे. ती बिचारी तर हॉस्पिटलमध्ये काम करुन दमून येते, पण माझ्यासाठी पुन्हा रात्री जागते.अरे यार! पण नाही मला हा अभ्यास करायला आवडत! त्यापेक्षा मला माझ्या आवडीचे व्हायोलिन का नाही शिकून देत? पण आता मात्र ठरवलंय मी की या सर्वांतून मुक्त होणार!मम्मी-पप्पांना वाईट वाटेल खूप! पण मला नाही पूर्ण करता येणार त्यांच्या अपेक्षा!म्हणूनच मी स्वतंत्र व्हायचे ठरवलंय! मी घरातूनच अशा ठिकाणी निघून जाईन की नाहीच शोधू शकणार कोणी मला! मी मुक्त होणार…. मी स्वतंत्र होणार …..

नाना- नानी

काय मिळवलं आम्ही मुलाला एवढे उच्च शिक्षण देऊन? परिस्थिती नसतानाही पै पै जमवून याला अमेरिकेला पाठवले. वाटले होते की म्हातारपणी तरी सुखात, आरामात आयुष्य जगता येईल. पण पोटच्या पोरालाच आम्ही जड झालो, तिथे दुसऱ्या घरातून आलेली ती मुलगी का आम्हाला प्रेम देईल? या वृद्धाश्रमाच्या चार भिंतीत फार कोंडल्यासारखं वाटते. आम्हाला स्वतंत्र व्हायचंय, स्वतःचे आयुष्य स्वतःच्या मनासारखं जगायला आवडेल आम्हाला! मिळवू शकू का आम्ही ते स्वातंत्र्य?

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन!

त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात आतल्या कोपऱ्यात तीन बातम्या होत्या….

* शहरातील एका सुखवस्तू कुटुंबातील महिलेची गळफास लावून आत्महत्या!

* शहरातील एका प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिक दाम्पत्याच्या १२वीत शिकणाऱ्या मुलाची राहत्या घरी हाताची नस कापून घेऊन आत्महत्या!

*शहरातील एका वृद्धाश्रमातील दाम्पत्याची विष खाऊन आत्महत्या !

मिताली, आशिष आणि नाना-नानी स्वातंत्र्यदिनादिवशीच स्वतंत्र झाले होते.त्यांना हवे होते ते स्वातंत्र्य त्यांनी मिळवले?

 

©️ डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लाखेच्या किड्याची  शरीर रचना (भाग २) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

☆ विविधा ☆ लाखेच्या किड्याची  शरीर रचना (भाग २) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

आजच्या भागात जाणून  घेऊया  लाखेच्या  किड्याची शरीर रचना.  लाखेच्या  किड्यात नरकिडा आणि मादी किडा अशी दोन लिंगे असतात.  नर  आणि   मादी  लाख किड्यांच्या  बाह्य  शरीर  रचनेत,  आकारमानात  आणि  काही  अवयवांमध्ये फरक असतो.  नर लाख किडा  हा आकारान मोठा आणि  लाल रंगाचा  असतो.  शरीराचे  डोके, वक्ष आणि  उदर असे  भाग  होतात.  डोक्याला स्पर्शिकांची (जशा झुरळाला असतात.) एक  जोडी  आणि  डोळ्यांची एक  जोडी  असते.  या किड्याला मुखांगे (हे असे अवयव असतात जे अन्न ग्रहण करण्यास आवश्यक असतात.) नसतात. त्यामुळं  हा नर लाख किडा  खाऊ  शकत नाही. वक्षाच्या खालील  बाजूस तीन पायांच्या  जोड्या  असतात.  पंख असतातच  असं  नाही.  उदर हा शरीराचा  सर्वात  मोठा  भाग  असतो.   उदराच्या पश्च  टोकाला पुरुषांचे जननेंद्रिय असते.  आता जाणून घेऊया मादी लाख किडा कोणती  वैशिष्टे  दाखवितो. मादी  शरीराने लहान असते.  तिच्याही डोक्याला  स्पर्शिकांची एक  जोडी  असते.  तशीच  एक  सोंडही असते.  मादी लाख किड्याला डोळे  नसतात. मादी लाख किड्याला पंख  आणि  पायही नसतात. यामागचं  कारण ही तसंच  मजेशीर  आहे.  मादी अळी एकदा  एका  जागी स्थिर  झाली  की मुळी सुद्धा हलत नाही. वापर न झाल्यामुळं तिचे पाय आणि  पंख दोन्ही  नष्ट  होतात.  युज अँड डिसयुज हे उत्क्रांतितत्त्व  इथं  सिद्ध  झालेलं  दिसतं. या मादी लाख किड्यापासून आपल्याला लाखेचं उत्पादन  मिळते.

आता  आपण  लाखेच्या  किड्याचे जीवनचक्र  कसे असते  हे बघू.  या किड्याच्या जीवनचक्रात अनेक अवस्था  दिसून  येतात. जसं १ डिंभ, २ नर लाक्षाकोष्ठ, ३ मादी  लाक्षाकोष्ठ, ४.पंखहीन प्रौढ नर, ५. पंखयुक्त प्रौढ नर, ६. प्रौढ  मादी, ७. पक्व मादी  लाक्षाकोष्ठ आणि  ८. झाडाच्या  फांद्या वरील  लाखेचा थर.

सूक्ष्म, नावेसारख्या आकाराच्या  लाल रंगाच्या  डिंभापासून या किड्याच्या  जीवनचक्रास सुरुवात  होते.  डिंभाची लांबी शून्य  पॉइंट  पाच मिमी. आणि  रुंदी शून्य  पॉइंट  पंचवीस मिमी. असते.  एक  निकोप  मादी  तीनशे  ते एक हजार डिंभांना जन्म  देते.  डिंभ ही स्वतंत्रपणे  अन्न  मिळवून जगणारी  अवस्था  असं  म्हणता  येईल.  डिंभाचं प्रौढ किड्याशी साम्य  नसते.  (सोयीसाठी इथून पुढे डिंभाचा उल्लेख अळी असा केला आहे)ज्या झाडांवर   या अळ्या वाढतात त्या; म्हणजेच आश्रयी वृक्षांच्या रसाळ, कोवळ्या डहाळ्यांवर त्या  स्थिरावतातही.  आपली सोंड सालीत खुपसून अन्नरस शोषून  घेतात. त्या दाट रेझीनयुक्त द्रव स्त्रवतात. त्या स्त्रावाने त्यांचे  शरीर  आच्छादले जाते.  हा स्त्राव अळ्यांच्या उपत्वचेखाली असणार्‍या ग्रंथींमधून  स्त्रवला जातो. फक्त मुख, दोन  श्वासरंध्रे, आणि  गुदद्वार या भागांवर लाख स्त्रवणार्‍या ग्रंथी नसतात.  अळी अशारितीने  स्वत:च्या स्त्रावाने बनलेल्या कोष्ठाच्या आवरणामध्ये बंदिस्त  होते.  काही  काळानं  सर्व  अळ्यांचा स्त्राव एकरुप होतो. त्यामुळं  डहाळीवर एक  टणक  अखंड  थर तयार  होतो. (त्याच किड्यांचं  जीवनचक्र  पूर्ण  झाल्यावर  आणि  पुढच्या  पिढीतील डिंभ बाहेर  पडण्यास सुरुवात  होण्याच्या  वेळेला  डहाळ्या  कापून  घेतात, वाळवितात  आणि  लाख मिळवण्याची प्रक्रिया  करतात.)

 

संकलन व लेखन

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ न फुटणारा आरसा… ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ न फुटणारा आरसा… ☆ श्री अरविंद लिमये ☆

वाचणे’ हे दोन अर्थ असणारे क्रियापद.एक एखाद्या संकटापासून,अरिष्टापासून सुटका होणे आणि दुसरा लिखित वाङमय,पुस्तके,संहिता यांचे वाचन करणे.वाचनाचे महत्त्व अधोरेखित करणारी ‘वाचाल तर वाचाल ‘ ही टॅग लाईन ‘वाचणे’या क्रियापदाचे दोन्ही अर्थ सामावून घेत वाचन संस्कृती लयाला जात असताना तिला वाचवू पहातेय. वाचनाचे महत्त्व पटवून देण्यापेक्षाही न वाचाल,तर तुम्ही निर्माण होणाऱ्या संकटांपासून वाचूच शकणार नाही याचा पोटतिकडीने इशारा देते.

वाचनाची आवड जाणिवपूर्वक जोपासणारे त्याचं महत्त्व तर जाणतातच,आणि वाचनातून आनंदही मिळवतात. किंबहुना वाचनाची आवड असणारे आहेत म्हणूनच लिहणारे लिहिते राहू शकतात.

वाचनाचे महत्त्व समजून घेण्यासाठी वाचनाकडे पहायचा दृष्टीकोन मात्र निकोप हवा.वाचन हे वेळ घालवायचे साथन नसावे. त्यापासून मिळणारे ज्ञान आत्मसात  करण्याची दृष्टी महत्त्वाची.वाचन फक्त ज्ञानच देत नाही तर जगावे कसे हेही शिकवते.वाचनाची आवड नसणार्ऱ्यांचं जगणं या संस्कारांअभावी झापडबंद होत जातं.माणसांची मनं वाचण्याची कला वाचनाने समृध्द केलेल्या मनाला नकळतच अवगत होत असते.त्यामुळे माणसांना समजून घेणे,स्विकारणे सहजसुलभ घडत जाते.जगाकडे आणि जगण्याकडे पहाण्याचा निकोप दृष्टीकोन सकस वाचनानेच प्राप्त होत असतो.लेखनप्रतिभेची देन लाभलेल्या भाग्यवंतांनीही आपल्या लेखनाचा कस टिकवून ठेवण्यासाठी विविध विषयांवरील इतरांचे लेखन आवर्जून वाचायला हवे.तरच त्यांच्या लेखनातले वैविध्य न् ताजेपण टिकून राहील.

लेखकाला त्याचं अनुभव विश्व लिहिण्यास प्रेरणा देत असतं,तसंच मनाला स्पर्शून  जाणारे लेखन वाचकालाही अनुभवसंपन्न करीत असते. लेखकाचं लेखन एक ‘न फुटणारा आरसा’च असतं. वाचणारा त्यात प्रतिबिंबित होणारं, एरवी दिसू न शकणारं स्वत:चं,स्वत:च्या जगण्याचं प्रतिबिंब अंतर्दृष्टीने  पाहू शकतो.अर्थात त्यासाठी सजग दृष्टीने वाचनाची आवड लावून घेणे न् ती जोपासने हे  महत्त्वाचे असते !

 

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लाखेचा किडा  (भाग १) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

☆ विविधा ☆ लाखेचा किडा  (भाग १) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

आपल्या  आजूबाजूला  अनेक  सजीव  हालचाल  करताना  दिसतात . काही  डोळयांना  सहज दिसतात  तर काहींच निरीक्षण  सूक्ष्मदर्शक  वापरुन  करावं  लागतं . ऋतुप्रमाणं या जीवांच्या  संख्येत बदल होताना दिसतो. काही किटक कोणत्याही हवामानात तग धरून राहतात. काही किटक मात्र ठराविक हवामानातच जिवंत राहू शकतात.

सुरवंट या किटकाचं सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरात रुपांतर होतं. मध चाखायला येणारी मधमाशी, रेशीम देणारे रेशमाचे किडे, शाई बनवण्याच्या कामात उपयोगी पडणारा लाखेचा किडा, परागीकरण करणारे किटक  असे माणसाला उपयोगी पडणारे किटक आहेत.

निसर्गानं माणसाला प्राणी आणि त्यांच्या पासून मिळणाऱ्या गोष्टींच्या रुपात एक अनमोल खजिना दिला आहे. प्राण्यांच्या विचित्र, विलक्षण आणि गुंतागुंतीच्या वर्तणुकीमुळं मानवाला त्यांच्या बद्दल नेहमीच एक औत्सुक्य वाटत आलं आहे. लाखेच्या किड्यानही मानवाचं कुतूहल असंच जागृत केलं.

लाखेचा वापर भारतात अगदी महाभारताच्या काळापासून होत आलेला दिसतो. कौरवांनी कुंतीसह पांडवांना जाळण्यासाठी लाखेचा महाल म्हणजेच लाक्षागृह बांधल्याची नोंद महाभारतात आढळते. अथर्ववेदातही लाखेचा उल्लेख आढळतो. यावरून पुरातन काळी हिंदूंना लाख आणि तिच्या उपयोगा विषयीची माहिती होती हे लक्षात येते.

इ.स. पू. बाराशेच्या सुमारास भारतात लाखेपासून शोभिवंत वस्तू तयार केल्या जात असा उल्लेख आढळतो. सतराव्या शतकातही व्यापाऱ्यांनी लाखेचं रंजकद्रव्य आणि शेलॅक (पत्रीच्या स्वरुपातील लाख ) ही उत्पादनं युरोपीय बाजारपेठेत नेली.

लाखेचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास मात्र बराच ऊशीरा सुरु झाल्याचे लक्षात येते. 1709 मध्ये फादर टाकार्ड यांनी लाखेच्या किड्याचा शोध लावला. 1782 मध्ये केर्र या शास्त्रज्ञानं प्रथम  कोकस लॅका असं नामकरण केलं. इतर  काही  शास्त्रज्ञांनी  ते मान्यही केलं . परंतु  नंतर  एकोणीसशे बावीस  मध्ये श्री . ग्रीन आणि  एकोणीसशे पंधरा मध्ये श्री. चॅटर्जी यांनी  या किड्याला टॅकार्डिया लॅका असं  नाव दिलं. फादर टाकार्डा यांच्या नावावरून टॅकार्डिया आणि  केर्र यांनी  दिलेल्या  नावावरून  लॅका. मंडळी, बघा बरं   “नावात काय नाही ?” नामकरणाची ही पध्दत मोठी  मजेशीर आहे. या दोन्ही शास्त्रज्ञांचा सन्मानही झाला आणि  कोणीही  इतिहासाच्या पानावरुन पुसलं गेलं नाही.

लाख  किडा अनेक झाडांवर तसेच  झुडुपांवर आढळतो. किंबहुना या झाडांवर  परजिवी ( parasite ) म्हणून राहतो. म्हणजे या झाडांच्या खोडातील रस शोषून तो आपली उपजीविका करतो. जसं . . . कुसुम, पळस ,  बेर  ,बाबुळ ,खैर अरहर  इत्यादी .

 

संकलन व लेखन

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बातमीचा “सूत्रधार तो” .. ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ बातमीचा “सूत्रधार तो” .. ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

(रविवारची टुकारगिरी)

मंडळी नमस्कार

‘मी परत येईन’ नंतर गेले काही दिवस सगळ्यांच्याच ओळखीची एक व्यक्ती प्रसिध्द झालेली होती  ती म्हणजे

बातमीचा “सूत्रधार” तो, इथे निरंतर न्यूज पाडतो

या सूत्रधाराने सांगितलेल्या किती गोपनीय बातम्या प्रत्यक्षात ख-या निघाल्या हा संशोधनाचा विषय होऊ शकतो पण यामुळे गेले काही दिवस वृत्तवाहिन्यांचा टि.आर.पी  वाढण्यास आणि तुमच्या आमच्या सारख्यांचे मनोरंजन होण्यात नक्कीच वाढ झाली हे आम्ही स्वतः या लेखाचे ‘सूत्रधार’ म्हणून अगदी खात्रीपुर्वक सांगतो

पण हाच सूत्रधार एकेकाळी अत्यंत विश्वासू असायचा. याचे नियोजन अनेक नाटकांतून दोन अंक जोडताना, भूतकाळात जाताना, कथानक पुढे नेताना, दोन – तीन वेगवेगळ्या घटना एकत्र गुंफताना दिग्दर्शक अगदी खुबीने करायचा.

आठवतीय ‘हमलोग’ मालिका. प्रत्येक दिवशी मालिका संपली की अशोक कुमार ‘सूत्रधार’ म्हणून येऊन बोलायचे

एखाद्या कार्यक्रमाचे ‘निवेदक’ हे ‘दिसणारे सूत्रधार’ . मात्र असे कार्यक्रम (इव्हेंट मॅनेजमेंट ) पुर्णत्वास नेणारे पडद्यामागचे असंख्य अदृश्य सूत्रधार ही महत्वाचे ठरतात, जे जास्त प्रसिध्द पावत नाहीत.  यात मी “सूत्र शिरोमणी” म्हणून पु.लं च्या ‘नारायणाचा’ आवर्जून उल्लेख करेन.

जाता जाता विविध स्नेहसंमेलने, शाळेचे मैत्री मेळावे, कवि संमेलने आणि अशा विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांचे ‘सूत्र’ संचलन करणा-या सर्व विभूतींची आठवण यानिमित्ताने करणे आवश्यक वाटते.

आरोपींना आम्ही पकडूच पण त्याच्या ‘ सूत्रधाराला’ ही बेड्या ठोकू असे ही आपण वाचतो आणि नंतर विसरतो.

मंडळी , पण अजून एक सूत्रधार आहे बरं जो आपल्या सगळ्यांना कठपुतली बाहुल्यांन प्रमाणे नाचवत आहे. देव, नियती, प्रारब्ध,  कर्म अशी काही वेगळी नावे ही या सूत्रधारास आहेत

यावेळची “ब्रेकींग न्यूज” ( सगळ्यात मोठी बातमी)

आत्ताच आमच्या अंतर्गत सूत्रांकडून असे सांगण्यात येत आहे की प्रस्तुत ( टुकार) लेखकाने जर सन १९९४- ते – १९९७. रासायनिक अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना ” सूत्रांचा” योग्य पद्धतीने अभ्यास केला असता तर आज या लेखकावर असा लेख लिहिण्याची वेळ आली नसती ?

तरीपण

जीवनगाणे गातच रहावे, ‘सूत्र ‘ धार ते समजून घ्यावे पुढे पुढे चालावे

( सूत्रधार) अमोल

१/१२/१९

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ते मोरपंखी बालपण ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ ते मोरपंखी बालपण ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

खरच नावांप्रमाणे आमचे बालपण मोरपंखी होतं. कसलेच टेंशन नाही.

दिवस भर शाळा करायची. भरपूर वेळ खेळायचे आणि उरलेला वेळ अभ्यास करायचा. थोडा अभ्यास पुरायचा कारण त्यावेळी मुलं शाळेत शिक्षक काय शिकवतात हे लक्ष देऊन ऐकायचे, कारण क्लास लावणे हे परवडत पण नव्हते आणि फॅड पण नव्हते आणि कोणत्याच शिक्षकांचा तो व्यवसाय पण नव्हता तेव्हा कोणतेच शिक्षक पैसे कमावण्यासाठी शिकवत नव्हते तर कुंभार जसा ओल्या मातीला आकार देतो त्याच प्रमाणे विद्यार्थी घडवत होते.

पोहायला शिकण्यासाठी आम्हाला कोणत्याही क्लासला घालावे लागले नाही. आमच्या गल्लीत विजू काका म्हणुन एक काका होते त्यांनी गल्लीतल्या प्रत्येक मुलाला पोहायला आलेच पाहिजे असा चंग त्यांनी बांधला होता. प्रत्येक मे महिन्याच्या सुट्टीत ते सगळ्या मुलांना पाटील विहिरीत घेऊन जायचे शिकवायला. कोणी येणार नाही म्हणायचेच नाही तर, त्यांनी प्रत्येक  मुलाला उत्तम पोहायला शिकवले. तिथे तासावर नाही तर तासनतांस डुंबत रहायचो आम्ही सगळे. शेवटी पोटात कावळे ओरडायला लागले की यायचो घरी, डबे, ट्यूब आणि दोर हे सारे साहित्य घेऊन. कोणतीही फी न घेता आत्मियतेने शिकवणार्या माझ्या त्या काकांना माझा सलाम. नित्य नेमाने त्यांच्याबरोबर जायचे हीच त्यांची फी.

आमच्या वेळी सायकल शिकायची म्हणजे पण एकधमाल असायची. एका तासाला आठआणे भाडे देऊन आधी सायकल भाड्याने घ्यायची आणि मग गल्लीतले ताई दादा यांनी कोणीतरी सायकल शिकवायची. मला आमच्या घराच्या शेजारी सुगंधा म्हणून रहायची, तिने सायकल शिकवली. कितीदा तरी पडले, खरचटले पण धडपडत सायकल शिकले एकदा, आणि सुरुवातीला त्याला एक घंटी असते हे लक्षातच यायचे नाही. घंटी वाजवायच्या ऐवजी मी तोंडानेच सरका सरका असे म्हणायचे. आत्ता मुलांना आधी नवीकोरी सायकल मिळते मग ते चालवायला शिकतात आमच्या वेळी मात्र आधी चालवायला शिका मग सायकल मिळेल अस होतं.

गेले ते दिवस जेव्हा रणरणत्या उन्हांतही आंबे तोडतांना झाडाची सावली मिळायची, चिंचा पाडताना, नकळत आंबट चव जिभेवर रेंगाळायची, मित्र जमवून जिगळी तयार करताना न कळत आपुलकी वाढायची.

आता मुलांच्या खिश्यात असतात कॅडबरी, च्युईंगम, टाॉफी , आमच्या वेळी खिसे भरलेले असायचे  आवळा, सुपारी आणि बोरांनी. मन तृप्त व्हायचे पेरू आणि करवंदानी. चिमणीचा घास म्हणून आवळा जेव्हा तोडला जायचा तेव्हा तो ऊष्टा कोणाला वाटत नसे. कोणीतरी खिश्यातून आणलेली मीठ मसाल्याची पुडी असायची त्याला तो लावून खाल्ला की त्याची चव तर अवर्णनीय असायची. आत्ता सारखे चॉकलेट नसायचे आमच्याकडे पण खिसे लाल वाटाणे, शेंगदाणे आणि फुटाणे ह्यानी भरलेले असायचे. आत्मियतेने भरलेले हे खिसे कधी रिकामे होऊन त्याच्या जागी शिष्टाचार आला हेच कळले नाही. कोणाच्याही झाडावर चढून पेरू तोडून खाताना कधी कमीपणा वाटला नाही, ना पकडले गेल्यावर एक धपाटा खाण्यात कमीपणा, कारण त्या धपाट्यात पण आपलेपणा असायचा आणि त्या काकूही दुसरे दिवशी आमची वाट पहायच्या. हेच जर आत्ता सापडलो तर लगेच म्हणतील विचारून घ्यायचा ना मी दिला असता, पण त्यांना कुठे माहिती की चोरून पेरू तोडून खाण्यात आणि त्या आपुलकीच्या धपाट्यात किती माया दडलेली असायची ते.

पूर्वी घरचे भडंग, कांदा कैरी अस घेऊन आम्ही उद्यानात जात असू आता हीच जागा पॉपकॉर्न कुरकुरे ने घेतली. एखाद्या वेळी येताना गुर्ऱ्हाळ्यात जाऊन उसाचा रस आणि आलेपाक म्हणजे आमच्या साठी मेजवानी असायची आणि आता पिझा, बर्गर ही संस्कृती होऊन बसली.

नारळाच्या शहाळ्याची जागा कधी पेप्सी ने घेतली हे कळलेच नाही,तसेच लिंबू सरबत कधी हद्द पार झाले आणि फ्रीझ मधे कोल्ड्रिंक कधी दिमाखात सजले ते ही कळलेच नाही. कोकम सरबताची जागा मीरिंडा ने घेतली आणि फ्रेंड सर्कल चा एक भाग बनून गेली.

आमच्या बालपणी कोणत्याही मित्र, मैत्रिणींच्या घरी थेट आत प्रवेश असायचा. आत्तासारखी फोन वर अपॉइंटमेंट घ्यावी लागत नसे.

मग सुट्टीत रंगायचा आमचा पत्यांचा एक डाव, कॅरम, नाहीतर कोणाच्या तरी गल्लीत लपंडाव, लगोरी, छप्पी. आताच्या मुलांना हे खेळ माहितही नसतील, बरोबर आहे म्हणा आम्ही रिकामे होतो ते बिझी असतात मोबाईल गेम्स आणि टीव्ही कार्टून पाहण्यात. आणी चुकून बाहेर पडलेच तर मॉल मधे जाऊन डॅशिंग कार खेळतात.

मला अजून एका गोष्टीची आठवण होते. मला आठवते ती टणटण वाजणारी हातगाडी. तो आवाज आला की सगळे गोळा व्हायचे  मस्त ऑरेंज, कोला चा बर्फाचा गोळा खायला आणि मुद्दामून जीभे वर चोळून जीभ रंगवायची. गेले ते दिवस गोळ्याचे, कुल्फी चे आणि हात गाडीच्या ऑरेंज कंँडीचे.

आता मिळते ती ट्रिपल लेयर, कसाटा , मस्तानी.

पण बर्फ चोखून खाल्लेले  समाधान यात कुठे ? पावसाळ्यात ते भाजलेले कणीस नाहीतर शेंगा म्हणजे आहाहा !!!! पर्वणीच. काय आली ना आठवण तुम्हाला पण तुमच्या बालपणीची??

खरच किती आठवणी, आता आठवणीच राहिल्या नाही का?

कुठे हरवले ते दिवस जेव्हा धडपडत सायकल शिकली जायची, कोणी तरी हक्काने पोहायला शिकण्यासाठी स्वतःच्या जिवाचा आटापिटा करायचे, आणि रणरणत्या उन्हातही सुखद सावली मिळायची.आपण मनात आणले तर हेच मोरपंखी दिवस आपण आपल्या पुढच्या पिढीला ही देऊ शकू, नाही का ?

पुन्हा कोकम, पन्ह, फ्रीझ मधे विराजमान होईल, कॉल्डड्रिंक, पीझा, बर्गर हद्द पार होतील आणि घरच्या भडंगाचा आस्वाद जिभेवर पुन्हा रेंगाळेल.

सहज मनाच्या कोपऱ्यातून ?1. 9.2020

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

03.10.2020

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रिफ्रेशमेंट – मी, कागद आणि पेन ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

☆ विविधा ☆ रिफ्रेशमेंट – मी, कागद आणि पेन ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

रिचार्ज व्हायचा आपापला एक फंडा असतो. कोणाचं गाणी ऐकून मन रिफ्रेश होतं तर कोणाचं चित्रपट बघून. पण माझे मन मात्रं  हातात लेखणी आली की रिफ्रेश व्हायला लागते.

माझी प्रत्येक रचना मग ती कथा असो कविता असो चारोळ्या असो अगदी आध्यात्मिकावरही लेख कविता असो ती माझ्या पेक्षा वेगळीच असू शकत नाही. मी जे लिहिते किंवा लिहिण्यासाठीजे शब्द निवडते..खरं म्हणजे मी त्याच शब्दांमध्ये असते.

रोजचं जीवन हे माझ्या लिखाणाचं मूळ लिखाण मला प्रेरणा देतात तर शब्द ऊर्जा आनंद..बोलायलाही खूप आवडतं आणि बोलतेही..अगदी पुस्तकांवरही ….

मनांचा मनाशी संवाद… प्रश्न माझेच आणि उत्तरेही माझीच…. ना तिथे हेवेदावे ना मतभेद.. फक्त समाधान

अतिव आनंद…मग मी म्हटलं संवादांना,क्षणांना,आठवणींना ,अनुभवांना ..तुम्हाला  मनात का कैद करू?

म्हणून मी कागदाशी मैत्री केली आणि त्या सर्वांना मी कागदावर उतरवतं गेले व्यक्त होत गेले. आजूबाजूला घडणारया प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकून त्याचेही अनुभव मी अगदी त्रयस्थ पणे मांडत गेली आणि अजूनही मांडत आहे… सूर्य ,चंद्र, पाऊस यांच्याशी सुद्धा माझी सलगी झाली आणि वेगळ्याच दृष्टीने जग कळू लागले.

शांततेपासून ते व्यक्त होण्याचा आणि अस्तित्वापासून ते परिपूर्णत्वाकडे नेणारा हा प्रवास…या प्रवासाने मला व्यक्त होता आले आणि मी लिखाणातून व्यक्त झालेही..आणि मी अजूनही व्यक्त होत आहे..

माझ्यातल्या मला शोधायला आवडतं आणि हो व्यक्त होऊन लिहायलाही आवडतं…

खरचं लेखणीचं एक वेगळंच विश्व असतं नाही का? व्यक्त व्हायला..

सोबत असतात कोरा कागद,पेन आणि भावना….

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

ठाणे

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आकाशगंगा ☆ सौ. सुनिता गद्रे

☆ विविधा ☆ आकाशगंगा ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

घटना तशी जुनीच. म्हणजे १९६५ सालातली. मी अकरावीत शिकत होते. म्हणजे त्यावेळचे मॅट्रिक. आमच्या सायन्सच्या सरांनी एके दिवशी रात्री आम्हा सर्व विद्यार्थ्यांना एका त्यावेळच्या तीन मजली बिल्डिंग च्या टेरेस वर बोलावलं होतं. अमावस्येची रात्र होती….. घाबरायचं कारण नाही. आम्हाला ते खगोल  शास्त्रातील’आकाश गंगा’प्रत्यक्ष दाखवून ग्रह तारे नक्षत्र यांची माहिती देणार होते.

आमच्या सायन्सच्या सरांइतका उत्साही शिक्षक मी आजवर पाहिला नाही. आपल्या विषयातील संपूर्ण ज्ञान त्यांना होते. आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची तळमळ ही होती. फिजिक्स केमिस्ट्री मधले कितीतरी प्रयोग …. अभ्यासक्रमाबाहेरचे …त्यांनी आमच्याकडून करवून घेतले होते.

त्या रात्री सरांनी उत्तर-दक्षिण पसरलेला तार्‍यांनी तुडुंब भरलेला चकाकणारा आकाशगंगेचापट्टा दाखवला. खूप सगळी माहिती सांगितली. त्यामुळे खगोलशास्त्राचा वेगळा अभ्यास करावाच लागला नाही.

लग्नानंतर दिल्लीला गेल्यावर बरेचदा मुद्दामून सातव्या मजल्याच्या टेरेसवर जाऊन मी आकाशगंगा शोधायचा प्रयत्न करायचे पण लाईटच्या झगमगाटात ती आकाशगंगा मला कधीच दिसली नाही. आता तर छोट्या छोट्या गावात सुद्धा बिजली च्या झगमगाटामुळे  आकाशगंगा आपल्यापासून खूप दूर गेलेली आहे. उन्हाळ्यात दिल्लीला आम्ही त्यावेळी रात्री टेरेस वर झोपायला जायचो. आता ए.सी मुळे. त्याही गंमतीला आपण मुकले आहोत.मुलांना मी थोडंसं लक्षात राहिलेला ज्ञान द्यायचे. मृगनक्षत्र… हरीण… त्याच्या पोटात घुसलेल्या बाणाचे तीन तेजस्वी तारे…. व्याध. तसेच सप्तर्षींचा  पतंग… दोरी सारखा खूप दूर असलेला ध्रुवतारा.. जो जास्त चमकत नाही… वशिष्ठ ऋषी.. त्यांच्या शेजारी छोटीशी चमकणारी अरुंधती ची चांदणी… सगळं त्यांना दाखवायचे. खरं तर सगळंच फार फिकट दिसायचं. शर्मिष्ठा देवयानी ययातीचा तो M सारखा तारा समूह.. जो एका वेगळ्याच आकाशगंगेच्या भाग आहे (बहुतेक). जो सरांनी दाखवला होता… तो मला कधीच दिसला नाही. शुक्र मंगळ ग्रह पण दिसले नाहीत. पुढं मुलं मोठी झाल्यावर मी त्यांना प्लॅनेटोरियम मध्ये घेऊन गेले होते. तिथं मॉडर्न टेक्निकनं दाखवलेली आकाशगंगा पाहिली. पण सरांनी दाखवलेली आकाशगंगा मला तिथं सापडलीच नाही…… ती हरवून गेली होती.

वर्षापूर्वी मला कर्नाटकातल्या एका खेड्यात जायचा प्रसंग आला. आम्ही तिघं जणं होतो. एका छोट्याशा स्टॅन्डवर बस थांबली. आम्ही आमच्या गंतव्या कडे… साधारण दोन-अडीच मैल चालत निघालो. तीपण अमावस्येची (एखादा दिवस मागेपुढे) रात्र होती. चालताना दृष्टी वर गेली आणि मुग्ध होऊन मी पाहतच राहिले. तो दक्षिणोत्तर पसरलेला तारकांचापट्टा-milky way-मला खुणावत होता. पूर्ण गोलाकार क्षितिज…. काळे कभिन्न आकाश.. ते म्हणजे एक खोलगट वाटी…. अन त्यावर चमकणारा आकाशगंगेच्या पट्टा. तो इतका जवळ वाटत होता की शिडीवर चढून आपण त्याला हात लावू शकू …. आणि हे काय?…. त्या मृगाच्या चौकोनात असंख्य तारे चमकत होते. मग मी माझ्या ओळखीचे तारे शोधण्याचा प्रयत्न करू लागले. ‘खरंच आता सर असायला हवे होते’ मनात विचार चमकून गेला.

पंधरा वीस मिनिटानंतर”काकू थांबू नको.. लवकर ये “. या पुतण्याच्या हाकेनं मी भानावर आले .’मध्ये रुपया ‘नसलेल्या सुपभर लाहया मी मनात भरून घेतल्या.

शेवटी लहानपणी पाहिलेली….अन् हरवून गेलेली आकाशगंगा मला सापडली होती.

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर. मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अस्तित्व ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी 

☆ विविधा ☆ अस्तित्व ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

एकवीस दिवसाच्या युरोप ट्रीप वरून आम्ही परतलो. अजूनही ट्रीपच्या मूडमध्येच होतो.

इतकं प्रगत राष्ट्र, इतकी मोहमयी दुनिया नजरेत साठवून घ्यावं असं सौंदर्य इतकी आधुनिकता भव्य रस्ते भव्य इमारती इतका सुरेख निसर्ग हे सर्व पाहून डोळ्याच्या बाहुल्या विस्फारल्या होत्या.

आल्या आल्या मला स्वयंपाकाच्या कट्ट्याचे दर्शन घ्यावं लागलं. चहा करण्यासाठी सरसावले तर डोळे आणखीनच विस्फारले ओट्याच्या एका कोपऱ्यात एक छोटासा हिरवा देठ आणि त्याच्यावरच पिवळे फूल मला खुणावत होतं.

जाताना मीच बीजारोपण केलं होतं जणू! मोहरीचा एक दाणा रुजला होता आणि आपलं अस्तित्व दाखवत होता. मी जणू त्याला पंधरा-वीस दिवसाचा ‘ब्रीदिंग टाईम ‘दिला होता एरवी रोजच्या साफसफाईत तो अंकुरला नसता.

खूपच गोंडस निरागस हिरवट इवलसं पिवळ्याधमक फुलांन नटलेलं असं ते हळुवार डोलत होतं.

माझ्या मनातील सौंदर्याची व्याख्याच बदलून टाकली त्याने

एक फुलले फूल आणि फुलून नुसते राहिले

त्या कुणी ना पाहिले…..

या गाण्यांच्या ओळी मला सहाजिकच आठवल्या. त्या क्षणी कवीच्या भावनाही समजल्या.

….मी युरोप मध्ये पाहिलेलं ट्यूलिप फूल सुंदर की हे मोहरीचं फुल याचा विचार करत बसले आणि दूध उतू गेलं.

अस्तित्वा साठीची ही त्याची धडपड मला जाणवली . माझ्या डोळ्याला ते दिसणं हे त्याचं असणं! आणि माझ्या हदयात त्याचं बसणं हे त्याचं अस्तित्व!!

नाही का?…

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नाटक…एक अपूर्व योगायोग..! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ नाटक…एक अपूर्व योगायोग..! ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

अगदी न कळत्या वयापासून एक प्रेक्षक म्हणून माझ्या जडणघडणीला सुरुवात झाली त्याला निमित्त ठरलं ते किर्लोस्करवाडीत व्यतित झालेलं माझं बालपण.किर्लोस्करवाडी ही टुमदार काॅलनी.तिथल्या सांस्कृतिक आणि संस्कारक्षम वातावरणातील मोकळे श्वास हेच आमचं (त्या काळातही बाहेरच्या जगात अप्राप्य असणारं) वैभव होतं.माझ्या मनात रुजलेली नाटकाची आवड ही त्या वैभवाचीच देन..!

त्या टुमदार काॅलनीत सुरक्षाव्यवस्थेचा भाग म्हणून बाहेरच्या कुणाचाच परवानगीशिवाय वावर नसे.घरी येणाऱ्या पाहुण्यांनासुध्दा संपूर्ण चौकशी होऊन व रजिस्टरमधे सविस्तर नोंदी करुन घेऊन मगच प्रवेश दिला जात असे.अशा वातावरणामुळे स्थानिकांच्या करमणुकीचं कोणतंच साधन तिथं उपलब्ध नव्हतं.सिनेमा पहायलाही शेजारच्या रामानंदनगरच्या तंबूमधे(टूरिंग टाॅकीज)जावं लागे.तेव्हा रेडिओही घरोघरी नसायचे.

यामुळेच काॅलनीतील नागरीकांची सांस्कृतिक गरज लक्षात घेऊन किर्लोस्कर व्यवस्थापनातर्फे पुण्यामुंबईतील व्यावसायिक नाटक कंपन्यांची नाटके निमंत्रित करुन त्याचे खास प्रयोग आम्हाला विनामूल्य दाखवले जायचे.त्या विद्यार्थी दशेत  तिथे पाहिलेली बाळ कोल्हटकरांची ‘वेगळं व्हायचंय मला’,’दुरितांचे तिमिर जावो’,बाबुराव गोखल्यांची ‘करायला गेलो एक’, ‘व-हाडी मानसं’ अशी कितीतरी नाटकं आजही मी विसरलेलो नाहीय.

शेजारच्या कुंडल या गावी त्याकाळी खूप प्रसिध्द असलेली ‘आनंद संगीत मंडळी’ नावाची एक नाटककंपनी होती.खरंतर नाटककंपनी ही संकल्पना नुकतीच लयाला गेलेल्या त्या काळात ही ‘आनंद संगीत मंडळी’ मात्र अद्याप आपला आब राखून कार्यरत होती.किर्लोस्करांतर्फे दरवर्षी आमंत्रित केल्या जाणाऱ्या या कंपनीचा तिथे सलग आठ दिवस मुक्काम असे आणि तो मुक्काम म्हणजे आमच्यासाठी गाजलेल्या संगीत नाटकांची पर्वणी..!माझी पुण्यप्रभाव, मंदारमाला,एकच प्याला सारख्या

सगळ्या गाजलेल्या संगीत नाटकांशी ओळख त्यामुळेच होऊ शकली.

बाबूराव गोखल्यांच्या ‘श्री स्टार्स’या संस्थेचं एक ठळक वैशिष्ठ म्हणजे त्यांच्या जाहिरातीतून जाहीर केली जाणारी नाटक सुरु होण्याची वेळ.प्रयोगाची वेळ रात्री ८वाजून २८ मिनिटे,किंवा ८वाजून १७ मिनिटे अशी एखाद्या शुभकार्याचा मुहूर्त असावा तशी जाहीर केली जायची.आणि तिसरी घंटा रात्री बरोब्बर आठ वाजल्यानंतरच्या नेमक्या त्या मिनिटाला होत असतानाच पडदा उघडला जायचा.नाटकाची अनाउन्समेंट होतानाही पहिला,दुसरा,तिसरा अंक संपण्याच्या आणि पुढचा अंक सुरु होण्याच्या अशाच ‘नेमक्या’ वेळा उदघोषित करून पाळल्याही जायच्या.त्यांची नाटकेही तशीच दर्जेदारही असायची.पण वेळेच्या बाबतीतली त्यांची ती शिस्त मात्र एकमेवाद्वितीयच.वेळेचं हे नियोजन खरंच थक्क करणारं.आज आठवलं तरी हे सगळं अविश्वसनीय आणि म्हणून स्वप्नवतच वाटत रहातं.

याखेरीज तिथल्या सोशलक्लबतर्फे काॅलनीतील हौशी कलाकारानी स्वत: बसवून सादर केलेली असंख्य नाटकेही आनंद देऊन गेलेली आहेत.एका वर्षी स्थानिक हौशी कलाकारांनी बसवलेल्या पु.लंच्या ‘सुंदर मी होणार’ या नाटकात पुढे कवी आणि गीतकार म्हणून रसिकप्रिय झालेल्या , तेव्हा नवतरूण असलेल्या सुधीर मोघे यानी केलेल्या कवी संजीव या भूमिकेची आठवणही मी विसरलेलो नाहीय.(श्रीकांत आणि सुधीर मोघे हे बंधूद्वय त्याकाळचे वाडीकरच.)

माझ्या न कळत्या वयापासून दर्जेदार नाटके सातत्याने पहायचा योग किर्लोस्करवाडीतील आमच्या वास्तव्यामुळे आला हे खरेच,पण पुढेही नोकरीनिमित्ताने मी प्रथम मुंबईत गेलो तो १९७१-७२चा काळ हा प्रायोगिक रंगभूमीचा पायाभरणीचा काळ तर होताच शिवाय आधुनिक व्यावसायिक रंगभूमीचा भरभराटीचा काळही होता.त्यात योगायोगाने माझे वास्तव्य शिवाजी मंदिरला चालत जाता येईल अशा दादरच्या नूर बिल्डिंग

मधे.त्यावेळच्या पगाराचा विचार केला तर तेव्हाचे नाटकांचे ४-५ रुपयांचे दरही न परवडणारेच वाटायचे.पण बालपणीच मनात पेरली गेलेली नाटकाची ओढ मला स्वस्थ बसू देत नव्हतीच.मग जमेल तिथे टोकाची काटकसर करत पैसे साठवून शिवाजी मंदिरला जाऊन नाटकं पहायची चैन करावी लागायची.त्यावेळी मी पाहिलेल्या नटसम्राट, संध्याछाया, जास्वंदी,अशा पुढे मैलाचा दगड ठरलेल्या असंख्य नाटकांनी माझ्यातला प्रेक्षक घडवतानाच माझ्याही नकळत माझ्या अभिरूचीला योग्य वळणही लावलं.पुढच्या काळात मी पाहिलेल्या विषवृक्षाची छाया, पुरुष,बॅरिस्टर,गारंबीचा बापू, हयवदन,ऋणानुबंध,सख्खे शेजारी,नातीगोती,हमीदाबाईची कोठी,महासागर यासारख्या असंख्य नाटकांच्या विषयवैविध्य आणि सकस मांडणीने मला कधीच विसरता न येणारा नाट्यानुभव दिलेला आहे.प्रेक्षकम्हणून मला घडवण्यात या सगळ्याच नाटकांचा महत्वाचा वाटा आहे.

या वेळेपर्यंत एक आवड म्हणून कथालेखनाचा व्यासंग जपलेल्या आणि त्यात बऱ्यापैकी स्थिर झालेल्या मला नाट्यलेखन हे एक वेगळंच तंत्र आहे आणि ते आपल्याला जमणार नाही असंच वाटायचं आणि मग मी दुधाची तहान ताकावर भागवावी तसा डोळसपणे नाटके पहात रहायचो.मी नाट्यलेखनाकडे वळलो तेही पुढे खूप वर्षांनंतर.तोही अतिशय अनपेक्षित योगायोगच होता.त्या संपूर्ण प्रवासाबद्दलही सांगण्यासारखं बरंच कांही आहे पण ते पुन्हा कधीतरी…!

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares