आपल्या चांगल्या कृतीचा चांगल्या भावनांचा देवालाही हेवा वाटो ईतके चांगले वागण्याचा प्रयत्न तरी करायला हवा ना? पाताळात जाऊनही एक दिवस का होईना पण भूलोकातील आपल्या प्रजेला भेटण्याचे भाग्य ज्याला मिळाले असे बळीराजाचे भाग्य सकल पुरुषांना मिळो म्हणून सर्व स्त्रियांनी केलेली प्रार्थना पतीची उदंड आयुष्याची कामना आणि यमानेही परत जावे म्हणून केलेले औक्षण•••
व्यापारी लोकांनी नव्या वहीत सरस्वती गणपती काढून केलेली पूजा आणि त्या दिवसापासून नव्याने हिशेब मांडण्याला सुरूवात•••
आपल्या आयुष्याचे सगळेच हिशेब आपल्यालाच मांडायचे असतात. जुने हिशेब पुसून जुने हेवेदावे विसरून नात्यांचे नवे हिशेब सुरू केले ना की सुखी जीवनाचे गणित बरोबर सुटते. म्हणूनच आज पासून प्रामुख्याने पती पत्नी नात्यातील रुसवे फुगवे दूर करून नवीन प्रेमाने सुरूवात केली की बाकीची सगळी नाती फुलाप्रमाणे आपोआप बहरातात.
पूर्वी फक्त बायकोने नवर्यालाच तेल लावून औक्षण करावे असे नव्हते तर••• आईने मुलाला, भावजयने दिराला, काकूने पुतण्याला, मामीने भाच्याला अशा अनेक नात्यांनाही दृढ केले जायचे. खर्या अर्थाने सण नात्यांचा साजरा करून संस्कृती जपली जायची. त्यामुळे स्त्रीचा मान सन्मान आपोआप व्हायचा
आज समाजातील प्रत्येक स्त्रीकडे बघण्याची दृष्टी बदलणे गरजेचे असल्याने सगळ्या स्त्रियांना आदराचे स्थान मिळून त्यांच्याशी असलेल्या सामाजिक नात्याचे स्मरण आज करून दिवाळीचा पाडवा/ बलीप्रतिपदा/ व्यापारी नव वर्षाची सुरुवात करताना या दिवसाच्या सगळ्यांनाच मंगलमय शुभेच्छा !!
आज दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा दिवस. आज समृद्धीची, संपन्नतेची पूजा केली जाते. यावेळी निसर्ग सुद्धा सर्वांगाने बहरून आलेला असतो. पावसामुळे धरणी हिरवीगार आणि शरद ऋतूचे आल्हाददायक वातावरण असते. शेतामध्ये धनधान्याचा हंगाम असतो. त्यामुळे आनंदाचे, चैतन्याचे वातावरण असते आणि हाच आनंद दिवाळीत ओसंडून वाहत असतो.
दारापुढे सुंदर रांगोळ्या, दाराला पाना फुलांचे तोरण, दिव्यांच्या माळा, फुलांच्या माळा, तेवत्या पणत्या, प्रकाशमान आकाश कंदील अशा थाटामध्ये प्रत्येक घर उजळून निघालेले असते. महालक्ष्मीच्या स्वागतासाठी सज्ज झालेले असते. मोठ्या उत्साहामध्ये लक्ष्मीपूजन केले जाते. दारिद्र्याचा अंधार दूर सारून समृद्धीचा दीप चेतवावा हा संदेश यावेळी सर्वार्थानं प्रकट होतो.
घरामध्ये, व्यवसायात समृद्धी रहावी, दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लक्ष्मीची पूजा करायची. त्याच बरोबरीने कुबेराची पूजा केली जाते. कुबेर हा देवांच्या संपत्तीचा राखणदार समजला जातो. तो संपत्ती संग्राहक, धनाधिपती, पैसा कसा राखावा हे शिकवणारा, स्वतःला संपत्तीचा मोह नसणारा, अतिशय निरोगी आहे असे त्याचे गुण सांगितलेले आहेत. तेव्हा धनधान्य प्राप्त झाल्यावर मनुष्याला अहंकाराची बाधा होऊ नये यासाठी कुबेराचे स्मरण करायचे.
‘लक्ष्मी’ला चंचल म्हणतात. पण लक्ष्मी चंचल नसते. लक्ष्मीवान माणसाची मनोवृत्ती चंचल असते. वित्त ही एक शक्ती आहे. त्यामुळे मानव देवही बनू शकतो आणि दानवही बनू शकतो. लक्ष्मीला भोग प्राप्तीचे साधन समजणाऱ्या माणसांचा ऱ्हास हा ठरलेलाच असतो. लक्ष्मीची पूजा करून तिचा योग्य सन्मान करणार्याची भरभराट तर होतेच. पण इतरांनाही तो सहाय्यभूत होतो. म्हणूनच दैन्य जाणवेल इतके कमी पण नको आणि बुद्धीचा तोल ढळेल इतके जास्त पण नको, इतकेच धन देवाने द्यावे अशी त्याची प्रार्थना करायला हवी.
लक्ष्मीचा वापर कोण, कशासाठी करतो यावर तिचे फळ अवलंबून असते. विपरीत मार्गाने वापरली जाते ती ‘अलक्ष्मी’, स्वार्थात वापरतात ते वित्त, दुसऱ्यासाठी वापरली जाते ती ‘लक्ष्मी ‘आणि देवकार्यासाठी वापरली जाते तिला ‘महालक्ष्मी ‘ म्हणतात. उदारहस्ते सांस्कृतिक कार्यात, सत्कार्यात लक्ष्मी खर्च करणाऱ्याच्या घरी ती पिढ्यानपिढ्या वास करते. म्हणूनच म्हणतात, ‘लक्ष्मी ही एक महान शक्ती असल्याने ती चांगल्या लोकांच्या हातातच राहिली पाहिजे, तरच तिचा सुयोग्य वापर होतो.
लक्ष्मी प्रमाणातच मिळाली पाहिजे. कारण लक्ष्मीच्या नाण्याला दोन बाजू असतात. तिचा वापर स्वार्थासाठी करायचा का परमार्थासाठी हे आपणच ठरवतो. तेव्हा या वित्ताला अनर्थ न मानता जीवन सार्थकी लावणारी शक्ती मानून तिचे पूजन करायचे. बुद्धीचा समतोल राहू दे अशी प्रार्थना करायची.
एक गोष्ट महत्त्वाची आहे गैर मार्गाने आलेली लक्ष्मी कधीही स्थिर राहत नसते. तिच्यापासून शाश्वत सुख मिळत नाही तर प्रामाणिकपणे मिळवलेली लक्ष्मी शाश्वत सुखासमाधानाने आपली झोळी भरते. म्हणूनच असे सांगितले जाते की, “जो दुसऱ्याचे ओरबाडून खातो त्याला विकृती म्हणतात, जो आपले स्वतःचे खातो त्याला प्रकृती म्हणतात आणि जो आपल्यातले इतरांना खाऊ घालतो त्याला संस्कृती म्हणतात”. हेच या लक्ष्मीपूजनाचे सार आहे. लक्ष्मीमातेने सर्वांवर भरभरून कृपा करावी अशी तिच्या चरणी प्रार्थना करूयात.
ज्यांना संस्कृत म्हणणे अवघड वाटते आणि जोडाक्षर म्हणणे गैरसोयीचे वाटते अशा लोकांनी धनत्रयोदशी म्हणण्याऐवजी वसुबारस नंतर धनतेरस असा फंडा तयार करून धनत्रयोदशीला धनतेरस असे नाव देण्याची रूढी निर्माण केली.
त्याचप्रमाणे धनत्रयोदशी ही कशासाठी आहे हे माहीत नसणाऱ्यांनी धनतेरस किंवा धनत्रयोदशी याचा संबंध धनाशी जोडून धनाची पूजा करण्याची रूढी निर्माण केली. धनत्रयोदशी म्हणजे धन्वंतरी पूजनाचा दिवस. धन्वंतरी चा धन त्रयोदशीला जोडून हा शब्द झाला आहे.
दिवाळीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पहिल्यांदा वसुबारस म्हणजे गाईचा आदर्श समोर ठेवावा. गाईचे शुद्ध दुग्धजन्य पदार्थ वापरून आपला आहार आरोग्यपूर्ण ठेवावा. नैसर्गिक आणि शाकाहारी पदार्थांचा वापर करून आहार संतुलित ठेवावा. हा वसुबारसचा संदेश आणि उद्देश.
त्यानंतर येणारे धनत्रयोदशी म्हणजे धन्वंतरीला आठवावे. धन्वंतरी ही आरोग्य देणारी देवता. त्याला आपण अलीकडच्या काळात देवांचे डॉक्टर असे म्हणून ही संबोधतो. उत्सव साजरा करताना आरोग्याची काळजी घ्यावी, स्वतःचे कुटुंबाचे आणि समाजाचे आरोग्य नीट राहावे, सर्वांनीच आरोग्यपूर्ण जीवन जगावे यासाठी धन्वंतरीची शिकवण सगळ्यात महत्त्वाची. हा संदेश उत्सव साजरा करण्यापूर्वी देण्यासाठी धनत्रयोदशीचं प्रयोजन असलं पाहिजे असं मला वाटतं.
अलीकडच्या काळात या संदेशाला जास्तच महत्त्व आहे. स्वतःचं आरोग्य सांभाळण्यासाठी आरोग्यपूर्ण, प्रदूषण रहित आणि शक्यतो आपुलकीच्या भावनेने घरीच आरोग्यपूर्णरित्या बनवलेले पदार्थ उत्सव साजरा करण्यासाठी सेवन करावेत. कुटुंबाच्या आरोग्यासाठी कुटुंबातील सर्व वयाच्या आणि सर्व परिस्थितीतील व्यक्तींना योग्य अशा पथ्यकारक आणि आरोग्यपूर्ण पदार्थांसाठी आग्रह धरावा हा कौटुंबिक उद्देश. सामाजिक आरोग्यासाठी एकमेकांच्या घरच्या शुद्ध आणि आपुलकीने बनवलेल्या पदार्थांची देवाण-घेवाण करावी. समाजाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी घरासभोवतीचे वातावरण स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण असावे यासाठी फटाक्यांसारख्या धोकादायक आणि प्रदूषणात्मक गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. आपले स्वतःचे घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ व निर्मळ राहावा यासाठी परिसराची स्वच्छता व परिसर दिव्यांनी उजळून निघावा प्रकाशाची पूजा व्हावी हा उत्सवाचा मूळ आत्मा. फटाक्यामधून आपण या मूळ आत्म्यालाच उडवून टाकतो असे नाही वाटत? विकतचे पदार्थ आणून आणि एकमेकांना देऊन आपण सामाजिक आरोग्याचा आत्माच हरवून टाकतो असे नाही वाटत? अलीकडे उत्सवांचं सामाजिकरण होण्याऐवजी व्यापारीकरण होत राहिल्यामुळे उत्सवाचे मूळ उद्देश आणि त्या उत्सवातील आनंदाचा आत्माच हरवून चालला आहे असे नाही का वाटत?
आज ‘ नरक चतुर्दशी ‘. आजची पहाट रांगोळ्यांनी सजलेली, दिव्यांनी उजळलेली मंगल-प्रसन्न पहाट असते. आज पहाटेचे अभंगस्नान, यमाचे तर्पण, नरकभय निवारणासाठी दिवा लावणे, देवदर्शन, फराळाचा आस्वाद, रात्री दिव्यांची आरास असा दिवसाचा दिनक्रम असतो.
स्वर्ग आणि नरक या संकल्पना बहुतेक सगळीकडेच रूढ आहेत. आयुष्यात चांगली कृत्ये केल्यास मृत्युनंतर स्वर्ग मिळतो आणि वाईट कृत्यांमुळे नरकात जावे लागते अशी समजूत आहे. या नरकाचे सर्वांनाच भय असते. तेव्हा या नरकभयापासून मुक्त होण्यासाठी आजच्या दिवशी एक दिवा लावावा आणि संध्याकाळी घर, मंदिर, मठ या ठिकाणी दिव्यांची आरास करावी असे सांगितले आहे.
आजच्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासूराचा वध केला. नरकासूर प्रागज्योतिष्पूर नगरीचा राजा होता. आपल्या असूरी शक्तीने तो देव आणि मानव सर्वांना त्रास देत असे. त्याने सोळासहस्र राजकन्यांना पळवून आणून आपल्या कैदेत ठेवले. त्यांच्या सुटकेसाठी भगवान श्रीकृष्णाने युद्ध करून त्याला ठार मारले. त्या आनंदाप्रीत्यर्थ लोकांनी उत्सव साजरा केला. दिवे लावून अंधाराला, संकटाला, भीतीला दूर पळवले.
मरताना नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला. आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. श्रीकृष्णाने तसा वर दिला. म्हणूनच आज पहाटेच्यावेळी अभ्यंगस्नान करतात. आसूरी शक्तींचा, आसूरी महत्त्वाकांक्षेचा शेवटी नाशच होतो असा संदेश ही कथा देते. म्हणून प्रत्येकाने या दिवशी चांगले वागणे, चांगल्याची साथ देणे असा संकल्प केला पाहिजे.
स्त्री उध्दाराच्या या कामासाठी सत्यभामेने पुढाकार घेतलेला होता. नरकासूराच्या बंदीवासात राहिल्याने या राजकन्यांना कलंकित मानले जाऊ नये, त्यांचे सामाजिक स्थान हीन होऊ नये म्हणून श्रीकृष्णाने त्या सर्व राजकन्यांशी विवाह केला अशीही कथा आहे.
स्त्रियांवरील अत्याचाराच्या बातम्या सतत ऐकायला मिळतात. त्यांना आळा कसा घालायचा हा खरा प्रश्न आहे. यासाठी कोणी श्रीकृष्ण धावून येईल असा चमत्कार होणार नाही. त्यासाठी सर्वांनीच आपल्या मनात श्रीकृष्णाचे विचार जागृत करून स्त्री शक्तीचे रक्षण केले पाहिजे. यामधे स्त्रियांनी सुद्धा सहभागी व्हायला हवे. आपले रक्षण आपणच करण्यासाठी आवश्यक गोष्टी लहानपणापासून शिकायला हव्यात. मन कणखर बनून अंगी धिटाई येईल. मुली स्वयंपूर्ण बनतील. त्याचबरोबर मुलांना लहानपणापासून स्त्रीचा आदर करायचा, स्त्री-पुरुष दोघेही समान आहेत, कोणत्याही प्रसंगात त्रास द्यायचा नाही असेच संस्कार द्यायला हवेत. त्यामुळे मुला-मुलींची मानसिकता विवेकी, सुदृढ व निकोप बनून ते मोठेपणी सुजाण, जबाबदार नागरिक बनतील.
प्रत्येकाने आपल्या मनातल्या परमेश्वराचे स्मरण ठेवले ; तर हातून वाईट कृत्य घडणारच नाहीत. जीवनाला नरक बनवणाऱ्या अस्वच्छता, आळस, प्रमाद, वासनांधता, व्यसनाधीनता या गोष्टी नरकासूरच आहेत. त्यांना आज नष्ट करायचे. वाईटातून चांगल्याची, अंधारातून उजेडाची वाट धरायची. तेव्हा चांगल्याचे रक्षण व्हावे, नाती जास्त जवळ यावीत यासाठी एकत्रितपणे पण नियम पाळत, सामाजिक भान राखत श्रध्देने, आनंदाने हा सण साजरा करू या.
(पूर्वसूत्र- आठवड्यातून ठरलेले दोन दिवस बँकेत येतानाच ‘लिटिल् फ्लावर’ मधे जाऊन कॅश व्यवस्थित मोजून घेऊन मी स्वतःच बँकेत घेऊन येऊ लागलो. कांही दिवस हे असं सुरू राहिलं पण अचानक एक दिवस या क्रमाला अतिशय अनपेक्षितपणे वेगळंच वळण लागलं आणि या सगळ्या चांगल्यात मिठाचा खडा पडला! मला मुळापासून हादरवून सोडणारी ती एक नाट्यपूर्ण कलाटणी मला पूर्णत: हतबल करून गेली होती!
मला पुढे येऊ पहाणाऱ्या एका अतर्क्य आणि गूढ अशा अनुभवाची हीच तर पार्श्वभूमी ठरणार होती आणि सुरुवातसुद्धा.. !) इथून पुढे —-
तो शुक्रवार होता. आमच्या रिजनल ऑफिसकडून आलेल्या फोनवर दुसऱ्या दिवशी शनिवारी संध्याकाळी ५. ३० वाजता अचानक ठरलेल्या ब्रॅंच मॅनेजर मिटिंगसाठी मला कोल्हापूरला येण्याचा निरोप मिळाला. योगायोग असा की मीटिंगच्या दुसऱ्या दिवशी रविवारी पौर्णिमा होती आणि मीटिंग संपताच सांगलीला घरी मुक्कामाला जाऊन तिथून रविवारी माझ्या नेमानुसार पौर्णिमेला नृसिंहवाडीला दत्तदर्शनासाठी जाणंही सुलभ होणार होतं.
पण हा निरोप मिळताच मीटिंगची आवश्यक ती माहिती गोळा करून फाईल तयार करायलाच खूप रात्र झाली. म्हणून मग रात्री उशिरा न निघता शनिवारी पहाटेच्या बसने निघायचं ठरवलं. रात्री अंथरुणाला पाठ टेकली आणि शनिवारी सकाळी ‘लिटिल् फ्लॉवर’ मधे जाऊन आपल्याला कॅश कलेक्ट करायचीय याची आठवण झाली. रिजनल ऑफिसच्या फोननंतर सुरू झालेल्या या सगळ्या गदारोळात शनिवारी कॅश कलेक्शनसाठी मला येता येणार नाहीय असा मिस् डिसोझांना निरोप देणं राहूनच गेलं होतं त्यामुळे कॅश कलेक्ट करणं क्रमप्राप्तच होतं.
शेवटी पहाटे उठून प्रवासाची तयारी करून मी बॅग घेऊन बाहेर पडलो ते नेहमीप्रमाणे आठ वाजताच. ‘लिटिल् फ्लाॅवर’ मधे जाऊन पैसे मोजून ताब्यात घेतले. बँकेत जाऊन पैसे व स्लीप सुजाताच्या ताब्यात दिली.
“कॅश नीट मोजून घे. मगच मी निघतो. ” मी गंमतीनं म्हटलं. ती हसली. समोर इतर कस्टमर्स थांबलेले होते म्हणून मग तिने मी दिलेली ती कॅश आणि स्लीप समोर बाजूला सरकवून ठेवली आणि…. “सर, असू दे. तुम्ही स्वत: कॅश मोजून आणलीय म्हणजे ती बरोबरच असणाराय. मी नंतर मोजते. तुम्हाला उशीर होईल. तुम्ही तेवढ्यांसाठी नका थांबू. ” ती मनापासून म्हणाली. ते खरंही होतंच. मला तातडीने स्टॅण्ड गाठणं आवश्यक होतंच. सर्वांचा निरोप घेऊन मी निघालो.
पुढचं सगळंच सुरळीत झालं. मीटिंग चांगली झाली. मला घरी रहाताही आलं. सर्वांना भेटता आलं. गप्पा झाल्या. आराम करता आला. रविवारी नृसिंहवाडीचं दत्तदर्शनही निर्विघ्नपणे पार पडलं. आणि मग नेहमीच्या चक्रात अडकण्यासाठी मी रविवारी रात्री उशिराची सोलापूर बस पकडली. पहाटे साडेपाचच्या सुमारास घरी पोचलो. थोडा आराम करायलासुध्दा वेळ नव्हताच. सगळं आवरून साडेआठला ब्रॅंच गाठली. रात्रभराच्या जागरणाचा शीण सोबत असल्याने उत्साह फारसा नव्हताच. पण जो होता तो उसना उत्साहही नाहीसा करणारं एक अशुभ आक्रित
ब्रॅंचमधे माझी वाट पहात होतं!मी केबिनमधे जाऊन बसलोही नव्हतो तेवढ्यांत माझीच वाट पहात असल्यासारखे हेडकॅशिअर सुहास गर्दे माझ्या पाठोपाठ केबिनमधे आले.
“गुड मॉर्निंग सर”
“गुड मॉर्निंग. बसा. कांही विशेष?”
“विशेष असं नाही… पण एकदा तुमच्या कानावर घालावं असं वाटलं. तुम्ही परवा शनिवारी इथून गेल्यानंतर थोडा घोळच झाला होता… ” ते म्हणाले.
“घोळ ? म्हणजे.. ?”
“म्हणजे.. ‘लिटिल् फ्लॉवर’ च्या कॅशमधे साडेआठशे रुपये कमी होते सर… “
“काय? अहो, भलतंच काय? कसं शक्य आहे हे?.. “
“हो सर. पन्नास रुपयांच्या सतरा नोटा कमी होत्या… “
एव्हाना प्रचंड दडपणाखाली असलेली सुजाता बोबडे केबिनबाहेर घुटमळत उभी होती, ती आत येऊन माझ्यासमोर खाली मान घालून उभी राहिली.
“सुजाताs. काय म्हणतायत हे?”
” ह.. हो सर. आठशे पन्नास रुपये.. शॉर्ट होते.. “
तिचा आवाज भीतीनं थरथरत होता. तिचे डोळे नेहमीप्रमाणे पाझरु लागले. ती उभीच्या उभी थरथरू लागली. टोकाच्या संतापाने माझं मन भरुन आलेलं असतानाही कांही न बोलता मी डोकं गच्च धरून क्षणभर तसाच बसून राहिलो. संतापाने भरलेल्या जळजळीत नजरेने सुजाताकडे पाहून तिला जायला सांगितलं. डोळे पुसत ती केबिनबाहेर गेली. मी व्यवस्थित पैसे मोजून हिच्याकडे दिलेले असताना आठशे पन्नास रुपये कमी येतीलच कसे? एखाद दुसरी नोट कमी असणंही शक्यच नव्हतं आणि पन्नास रुपयांच्या सतरा नोटा कमी?शक्यच नाही. माझ्या मनातला संशयी विचार सुजाताच्या पाठमोऱ्या आकृतीचा पाठलाग करत राहिला. तिचे कौटुंबिक प्रश्न, थोड्याच दिवसात येऊ घातलेलं तिचं बाळंतपण, आर्थिक ओढग्रस्तता.. सगळंच माझ्या मनातल्या संशयाला पुष्टी देणारंच होतं. पण तो संशयाचा कांटा मनात रुतण्यापूर्वीच मी क्षणार्धात उपटून तो दूर भिरकावून दिला. नाही… सुजाता असं कांही करणं शक्य नाही… ! मी माझ्या मनाला बजावून सांगितलं. पण तरीही ते साडेआठशे रुपये गेले कुठं हा प्रश्न मात्र माझं मन कुरतडत राहिला.
“सुहास, इतर कुठल्यातरी रिसीटमधे चूक असेल.. काहीतरी गफलत असेल. त्या कॅशमधे चूक असणं शक्यच नाही… “
” सगळ्या रिसिटस् दोन दोनदा चेक करून खात्री करून घेतलीय सर. सगळं बरोबर होतं. त्यादिवशी सगळेजण खूप उशीरपर्यंत याच व्यापात होतो. पण आता काळजीचं कांही कारण नाहीय सर. त्या संध्याकाळी आम्ही प्राॅब्लेम साॅल्व्ह करुन मगच घरी गेलो सर. आता प्रॉब्लेम मिटलाय. पैसेही वसूल झालेत. “
“मी ‘लिटिल् फ्लाॅवर’ला त्याच दिवशी संध्याकाळी फोन करून सांगितलं सर. तुम्ही मीटिंगसाठी कोल्हापूरला गेलायत हेही सांगितलं. त्यांनी लगेच पैसे पाठवले सर. “
ऐकून मला धक्काच बसला. काय बोलावं, कसं रिअॅक्ट व्हावं समजेचना. मिस् डिसोझांना फोन करण्यासाठी रिसिव्हर उचलला खरा पण हात थरथरू लागला. फोन न करताच मी रिसिव्हर ठेवून दिला.
माझ्या अपरोक्ष नको ते नको त्या पद्धतीने घडून गेलं होतं. सुहास गर्देने बाहेर जाऊन स्वतःचं काम सुरू केलं, पण जाताना त्याच्याही नकळत त्यानं मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय असंच वाटू लागलं. मी शांतपणे डोळे मिटून खुर्चीला डोकं टेकवून बसून राहिलो. पण स्वस्थता नव्हती.
माझ्या मिटल्या नजरेसमोर मला सगळं स्वच्छ दिसू लागलं होतं… ! हो. हे असंच घडणाराय.. !माझ्यासमोर उभं राहून मिस् डिसोझा संशयग्रस्त नजरेने माझ्याकडे पहातायत असा मला भास झाला… न्.. मी भानावर आलो. खुर्ची मागे सरकवून ताडकन् उठलो.
काहीतरी करायलाच हवं… पण काय? मन सून्न झालं होतं. काय करावं तेच सुचत नव्हतं. आणि.. आणि अचानक.. अस्वस्थ मनात अंधूक प्रकाश दाखवू पहाणारा एक धूसर विचार सळसळत वर झेपावला… आणि केबिनचं दार ढकलून मी बाहेर आलो… !
वसुबारस ला दिवाळीची सुरुवात तर झालीच, पण आजचा धनत्रयोदशीचा दिवस हा अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे! या दिवसाच्या नावातच धनाचे महत्त्व कळते! पौराणिक द्रुष्ट्या या दिवसाच्या वेगवेगळ्या कथा तर आहेतच, पण वैद्य किंवा डॉक्टर म्हणून या दिवसाचे महत्त्व मला लग्नानंतर अधिक जाणवले. ह्यांचा वैद्यकीय पेशा असल्यामुळे या दिवशी संध्याकाळी आम्ही धन्वंतरीची पूजा करत असू. धन्वंतरीच्या फोटो समोर ह्यांची रोजच्या वापरातील शस्त्रे म्हणजे स्टेथोस्कोप, सीझर वगैरे ठेवून पूजा केली जाई. धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करत असू. आपल्या हातून रोग्यांची चांगली सेवा व्हावी यासाठी प्रार्थना करत असू.
वैद्यकीय काम हे व्यवसाय नसून सेवा आहे ही भावना कायम मनात ठेवलेली होती. पैसा ही गोष्ट त्याकाळी थोडी दुय्यम होती.
यावरून एक दोन आठवणीत राहिलेल्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात. एक वर्षी धनत्रयोदशी आणि नरक चतुर्दशी एका च दिवशी होती बहुतेक! आम्ही सकाळी फराळाला बसलो असताना धावत पळत एक जण आले, त्यांच्या मुलाने फटाके उडवताना हात भाजून घेतला होता. फराळाच्या ताटावरून उठून डॉक्टर तसेच पेशंट बघायला आधी गेले. सण-वार काहीही असले तरी आपला वैद्यकीय पेशा महत्त्वाचा समजून नेहमी पेशंट्सना प्राधान्य दिले जाई. कधीकधी अगदी चिडचिड होत असे, की काय हा डॉक्टरचा व्यवसाय! पण स्वेच्छेने पत्करलेला असल्यामुळे तो राग तात्पुरता च असे. दिवाळीच्या दिवसात फटाक्यांमुळे होणार्या छोट्या छोट्या अपघातांना बरेच वेळा तोंड द्यावे लागत असे. पण
धन्वंतरी च्या कृपेने यांच्या व्यवसायात नेहमी यश मिळत गेले हे मात्र खरे!
अशीच एक आठवण ! सिविल हॉस्पिटल मध्ये R. M. O. म्हणून काम करत असताना ह्यांची दिवाळी बरीचशी दवाखान्यातच साजरी होत असे! एके वर्षी सासूबाई आजारी असताना दिवाळीपर्यंत सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होत्या, तेव्हा त्यांच्याजवळ मी थांबत असे. हॉस्पिटल मधील धनत्रयोदशी अनुभवायला मिळाली. तेथील सर्व स्टाफ रात्रीच्या ड्युटीवर असताना आकाश कंदील लावणे, पताका लावणे, मेणबत्त्या, पणत्या लावणे, रांगोळ्या काढणे हे सर्व घरी जसे उत्साहाने साजरे करतो तसेच तिथे साजरे करत होते. आजारी माणसांना आनंद मिळावा म्हणून हे सर्व लोक झटत होते. ते पाहून खरोखरच मन भारावून गेले. संध्याकाळी तिथे धन्वंतरी ची प्रतिमा उभी करून पूजा करण्यात आली. बऱ्याच जणांनी पेशंट साठी फराळाचे वाटप केले होते. एकंदरच आपल्या हिंदू समाजामध्ये कोणत्याही सणाचा, उत्सवाचा आनंद सर्वांसोबत घेतला जातो, ही गोष्ट खूपच छान वाटली!
आरोग्य आणि धन या दोन्ही गोष्टी आयुष्यात महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी आपले आरोग्य जपण्याबरोबरच धनाची पूजा करून परमेश्वराबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आपण
आनंदाने साजरा करू या!
….. दिवाळी सारख्या मोठ्या सणाचे स्वागत करून अमंगल ते सर्व जाऊ दे अशी धन्वंतरीची प्रार्थना करू या!
मनाने एक हळुवार गिरकी घेतली. ‘ दिवाळी ‘वर्षाचा मोठा, रंगांचा, प्रकाशाचा सण! अनेकविध रंगांचे आकाराचे आकाशदीप नक्षीदार सुंदर रांगोळ्या, अभ्यंगस्नान, नवी कोरी विविध रंगांची सुंदर वस्त्र प्रावरण, झगमगत्या रंगीत दिव्यांच्या माळा, घरात दारात, अंगणात प्रकाशणारे दीप- पणत्या अन् तिखट गोड पदार्थांनी सजलेली तबकं, फुलबाज्या, चक्र, फटाके, सू़ं सूं आवाज करीत आकाशांत झेपणारे बाण, अशी कितीतरी आतिषबाजी, पाहुण्यांची- मित्रमंडळींची वर्दळ, पहाटेच सर्व आवरून, पूजाअर्चा करून देवळात देवाला जायची लगबग.. मग फराळ, पक्वांनाच जेवणं, सगळंच कसं आनंदमय वातावरण अगदी हवंहवंस. !
पूर्वीची दिवाळी अन् -आजची दिवाळी यात फरक आहे तो दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतीचा. तरीही, आनंद तोच उत्साह तोच असतो…. दिवाळीला आपल्याकडे एक धार्मिक अधिष्ठान आहे ते पूर्वी इतकंच आजही पाळलं जातं प्रत्येक दिवसाचं धार्मिक महत्त्व असलं तरी सर्वांनी म्हणजे आप्त-स्वकीयांनी एकत्र यावं भेटी घ्याव्या असा हा आनंदाचा सण! वेगवान जीवन चक्रात सगळंच बदलत गेलं. चाळ, वाडे संस्कृती इतिहास जमा होत गेली. सगळ्यांनी मिळून एकत्र सण साजरा करायला जमत नाही. जागा लहान, वेळ कमी यातच सगळं आलं. त्यामुळे मी आणि फक्त माझंच असा विचार घेऊन प्रत्येकाचं किंवा आपल्या छोट्या कुटुंबाचं वेगळं छोटसं वर्तुळ तयार झालं. फ्लॅट संस्कृती आली. आता मनासारखंच घरालाही मोठं प्रशस्त अंगण फारसं दिसत नाही. तरीही आप्तस्वकीय मित्रपरिवार सर्वांना यानिमित्ताने भेटणारे आणि आवर्जून बोलावणारे ही आहेत. घरोघरी घरकुल, किल्ले जरी होत नसले तरी सोसायटीच्या प्रांगणात लहान मोठी मुले -मुली मिळून त्याचा आनंद घेतात अगदी चढाओढीने किल्ले घरकुल बनवतात… आज राजाच्या घरी रोजच दिवाळी असते म्हणतात. तसे आज सगळेच राजे आहेत मनात आलं की तयार पिठापासून तयार पदार्थांपर्यंत अगदी गोड तिखट हवं तसं आणि हवं तेव्हा मिळतं पण, त्यात गृहिणीच्या म्हणजे घरच्या अन्नपूर्णेच्या हाताची चव असते का?.. आमच्या वेळी.. वगैरे असं काहीच म्हणायचं नाही मला कारण काळाप्रमाणे बदल होतच असतात. प्रत्येकाने बदलायलाच हवं. आताच्या गृहिणीला वेळ नसतो पण हौस तर असते तेव्हा, हे आपण समजून घ्यायला हवं… लक्ष्मीपूजन, पाडवा, आजही दणक्यातच साजरे होतात. बहिण भावाच्या निस्वार्थी प्रेमाचं प्रतीक म्हणजे भाऊबीज. हा दिवाळीतला महत्त्वाचा दिवस. भावाने बहिणीकडे यावं बहिणीने त्याला फराळ अन् सुग्रास भोजन द्यावे. आपल्या भावाला उदंड आयुष्य मिळावं सुख समृद्धी मिळावी. ही देवाला प्रार्थना करीत त्याला ओवाळावं. बालपण आठवावे. मन- मोकळ्या सुखदुःखाच्या गोष्टी कराव्यात… पण आज ‘ओवाळणं ‘हा एक सोपस्कार झालाय का असंही वाटतं. दोघा बहिण भावांना आपल्या वर्तुळातून वेळ काढणं अवघड होऊ लागलंय. असं का झालं? कधी झालं ? हे प्रश्न तसे अवघडच. हा काळाचा महिमा की, संवादाचा, पैशाचा हे कळेनासं झालंय.
लहानपणी भाऊबीजेला मिळालेली रिबन, नक्षीदार पिना, बांगड्या, यात समाधान असायचं. वडिलांकडून पाडव्याला मिळालेल्या ‘बंद्या’ रुपयांचं भारी अप्रूप वाटायचं. आज ज्येष्ठत्व आलं – वयही उताराला लागलं.. त्यामुळे पूर्वीची दिवाळी व आजची दिवाळी मनात रुंजी घालतेच. तरीही, आज’ ‘प्रकाश- ज्योती’ उजळतांना वाटतं..
खरंच, आजची दिवाळी बदलली आहे का? पण नाही.. सगळं तर तसंच आहे. एवढंच की त्यावेळी एवढा लखलखाट, झगमगाट, डामडौल नव्हता. आज नव्या युगाची ‘नवी दिवाळी ‘तेव्हा सारखी मर्यादित नाही. दिवाळी पहाट सारखे कार्यक्रम, खास अशी नाटक, सिनेमा असतात. दिवाळी अंकांनी, पुस्तकांचे स्टॉल सजतात. रसिक आवर्जून याचा आनंद घेतात. आमच्यासारख्या ज्येष्ठांना ती पर्वणीच वाटते. तरुण पिढीला नव्या पिढीला सहली सहभोजन असा सुट्टीचा आनंद कुटुंबाबरोबर घेता येतो एरवीच्या धावपळीत ते शक्य होत नाही म्हणून वाटतं सगळंच हरवलं नाही पण जे कुठे उणं वाटतं, बिनसलंय, यासाठी आपल्या मुलांना नातवंडांना नात्यांतील आपलेपणा, पावित्र्य, प्रेम संबंध, टिकवून ठेवण्याची गरज – या गोष्टी आपणच समजावून सांगायला हव्यात. कुटुंब वर्तुळाचा परीघ वाढविल्यानंतरचे फायदे त्यातील आनंद सांगायला हवेत. त्यांना पटले तर आनंदाचं आहे. तसेच समाजाचे ऋण मानून आपल्याबरोबर दुसऱ्याच्या अंगणातही ‘प्रकाशाचा दिवा’ लावणारेही आहेत. संस्था आहेत. त्यांच्याबरोबर सहकार्यासाठी, आपण असायला हवं. ही काळाची चांगली पाऊले आपणही टाकायला हवीत ! यासाठी दिवाळीच योग्य ! अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा सण आहे. दिव्याने दिवा लावून आपल्याही ज्ञानज्योती’ उजळूयात -. ! याच “दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा.. !”
आज ‘ धनत्रयोदशीचा ‘ दिवस. दिवाळी सणाच्या रुपाने सुखाचे, समाधानाचे, समृद्धीचे जीवन लाभावे अशी कामना प्रत्येकजणच करतो. त्यासाठी समृद्धीची म्हणजे धनाची पूजा केली जाते. आज संध्याकाळी धने, गुळ, पिवळी फुले वाहून धनाची म्हणजे पैशांची पूजा करतात. आणखी एक गोष्ट म्हणजे संपन्न जगण्यासाठी बुद्धी आणि धन जितके महत्त्वाचे तितकेच आरोग्यही महत्त्वाचे असते. म्हणूनच आज आरोग्यदेवतेचे सुद्धा पूजन करतात.
समुद्र मंथनातून निघालेले पाचवे रत्न म्हणजे ‘धन्वंतरी’. याच धन्वंतरीला आरोग्याची देवता मानतात. याच धन्वंतरीची आज पूजा करून उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी तिची प्रार्थना करतात.
याशिवाय आजच्या दिवशी आणखी एक गोष्ट सांगितली आहे;ती म्हणजे अपमृत्यू टाळण्यासाठी यमाला म्हणजे मृत्यूच्या देवतेला दक्षिणेकडे तोंड करून दीपदान करावे. पद्म पुराणानुसार अपमृत्युच्या विनाशा करता आणि यमाच्या सत्कारासाठी दीप लावावेत असे सांगितलेले आहे.
याबाबतची एक आख्यायिका सांगतात. हैमराजाला पुत्रप्राप्ती झाली. त्या पुत्राची कुंडली पाहून ज्योतिषांनी भाकीत केले की, त्याच्या विवाहानंतर चौथ्या दिवशी सर्पदंशाने त्याचा मृत्यू होईल. तो मृत्यू टाळण्यासाठी राजाने शक्य ते सर्व प्रयत्न केले. पण अखेर ज्योतिषाची भविष्यवाणी खरी ठरली. राजाला आणि प्रजेला अतोनात दुःख झाले. हे पाहून यमदूतही व्यथित झाले. त्यांनी यमराजाला प्रार्थना केली की, ‘असा अपमृत्यू कोणाच्याही वाट्याला येऊ नये’. यमराज गंभीर झाले आणि त्यांनी असा वर दिला की ‘ दिवाळीचे पाच दिवस जे लोक दीपोत्सव करतील त्यांच्या वाट्याला असं दुःख येणार नाही. ‘
माणूस वृद्धापकाळाने जाणे हा झाला नैसर्गिक मृत्यू. तो कुणालाही चुकलेला नाही आणि चुकविता येतही नाही. पण आजारपणाने, रोगराईने, सर्पदंशाने अवेळी जाणे म्हणजे अपमृत्यू. पूर्वी अशा मृत्यूंचे प्रमाण फार होते. त्यामुळेच असे अपमृत्यू टाळण्यासाठी देवाची प्रार्थना केली जायची.
आज-काल वैद्यक शास्त्र अतिशय प्रगत झालेले आहे. इतरही सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे अशा मृत्यूंचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे. पण आज-काल वेगळ्या अपमृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. अपघात, घातपात, आत्महत्या, व्यसनाधीनतेमुळे होणारे मृत्यू खूप वाढलेले आहे. हे सर्व अपमृत्यूच आहेत. शिवाय पूर्वी प्लेग, कॉलरा असे आजार होते. तर आता काविळ, डेंग्यू ताप, स्वाईन फ्ल्यू, कोविड-१९ असे आजार आले आहेत.
पण यातल्या बऱ्याच गोष्टी टाळणे तर आपल्याच हातात आहे. या सणांचा हाच मूळ उद्देश असतो. परिसराची जशी स्वच्छता करायची तशीच मनाची सुद्धा करायची. म्हणजे दुरावा विसरून नाती पुन्हा घट्ट करायची. थोडं आत्मचिंतन, थोडं आत्मपरीक्षण करायचं. व्यसनं दूर सारून, अती राग, द्वेष, अतीवेगावर नियंत्रण करून हे अपमृत्यू नक्कीच कमी करता येतील.
आजच्या दिवशी आरोग्याला घातक व्यसनांचा त्याग करून आरोग्यपूर्ण जीवनाचा निश्चयच आपण सगळ्यांनी केला पाहिजे. सगळ्यांनी या मागचा विचार समजून घेतला पाहिजे म्हणजे, या सणांचा आनंद निश्चितच द्विगुणित होणार आहे. म्हणूनच आज दीपदान करायचे.
मुळामध्ये दिवाळी हा दीपोत्सव असल्यामुळे दिवा हा केंद्रस्थानीच असतो. म्हणूनच घराघरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी विविध प्रकारांनी दिव्यांची आरास केली जाते. सारा आसमंत उजळून जातो. मन आनंदाने, उत्साहाने भरून जाते.
हे असे अनेक दिवे मिळतात. ते घरी आणा. . . दारात, खिडकीत, गच्चीत, गॅलरीत लावा. . .
त्यांच्या उजेडाने चैतन्य, आनंद घरभर पसरेल. . . . दिवे हीच तर आपल्या दिवाळीची ओळख आहे. . .
आता यावर्षी अजून एक वेगळा उपक्रम करूया… या दिव्यांबरोबरच अंतरंगात एक ज्ञान दिवा लावूया
नवं काही शिकूया… अगदी फार मोठी गोष्ट शिकायला पाहिजे असे काही नाही…
छोटीशी असली तरी चालेल. . ती पण आनंद देते…
…. एखादी कला आत्मसात करून घेऊया…
…. सामाजिक भान राखून समाजासाठी जमेल तेव्हढे एखादे काम करूया…
… आधुनिक नव विचारांचा. . स्वीकार करूया… हळूहळू त्याची सवय होईल…
… हा संदेश, वारसा पुढच्या पिढीला पण देऊया.
… हा ज्ञान दिवा पेटता राहील. . तो अखंड उजेड पाडेल. . . . आपल्या पुढच्या आयुष्याच्या वाटेवर. . .
त्याच्या प्रकाशात चालणे सुखावह आनंददायी आणि सुरक्षित असेल. . .
मनोनिग्रह, प्रयत्न, सातत्य यांचा अभ्यास, सराव असला की तेवढे तेल या दिव्याला पुरेसे आहे…
दिवाळी संपली तरी सुखावणारा हा ज्ञान दिवा आहे.
अशीच एक… छोटी पणती… आपल्या हृदयात लावूया
… आपलेच अंत:करण उजळणारी शांतपणे तेवणारी. . .
ही दिवाळीच्या चार दिवसांसाठी नाही तर. . . अखंड तेवणारी हवी. .
त्यासाठी जिव्हाळा , दया, माया, प्रेम, आपुलकीची स्निग्धता हवी. . . . मगच ही पणती अखंड जळत राहील. .
कारण हा तेजाचा उत्सव आहे. आपल्याला प्रकाशाची आराधना करायची आहे…. त्यावर काजळी धरू नये म्हणूनही काळजी घेऊया…. आपल्याच शब्दांची …. नाही तरी शब्दांचाच तर सारा खेळ असतो…
” दीपज्योती परब्रम्ह दीपज्योती जनार्दन
दीपेन हरते पापं दीपज्योति नमोस्तुते “
… ह्या दिव्याचं महत्त्व इतकं आहे की या ज्योतीला प्रत्यक्ष परब्रम्ह मानलेले आहे. ती जणू काही परमेश्वर
आहे म्हणूनच तिला नमस्कार करायचा, कारण ती मनातल्या पापाचा आणि अंधाराचा नाश करते. किती विशाल अर्थ सांगितला आहे आपल्या पूर्वजांनी. . . . .
हो. . . पण त्याबरोबर दाराशी अंधारात शांतपणे जळणारी एक मातीची पणती पण असू दे. . . . . तीच तर आपले पाय भक्कमपणे मातीशी जोडून आपल्याला जमिनीवर ठेवते. . . . .
आजपासून दिवाळीचा सण सुरू होतो आहे. गेल्या सात-आठ महिन्यातील सणांप्रमाणे दिवाळी सणावर सुध्दा करोनाच्या साथीचे सावट आहे. उत्सवाला धास्तीची किनार आहे. पण सर्व नियम पाळत, स्वच्छता राखत, अगदी साधेपणाने आपण हा सण साजरा करणार आहोत. सामाजिक अंतर राखत पण मनामनातलं अंतर कमी करत नाती जास्त सुदृढ करणार आहोत. कारण प्रत्येक सणाचे हेच तर प्रयोजन असते. हा तर ‘दिवाळीचा सण’
दिवाळी हा फक्त एकच उत्सव नाही बरं का ! तर हे उत्सवांचे स्नेहसंमेलन आहे. हा फक्त एकाच देवतेचा उत्सव नसून तो लोकव्यवहाराशी जास्ती जोडलेला आहे. मुख्य म्हणजे हा प्रकाशाचा उत्सव, नात्यांचा उत्सव, लक्ष्मीचा उत्सव, निसर्गाचा उत्सव, विजयाचा उत्सव असे अनेकरंगी पदर असणारा उत्सव आहे.
अश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया असे सहा दिवस हा उत्सव साजरा होतो. त्यातला पहिला दिवस म्हणजे ‘गोवत्स द्वादशी’. यालाच “वसुबारस ” असेही म्हणतात. आपल्या संस्कृतीत गाय फार पवित्र मानली जाते. लक्ष्मीच्या अंशापासून उत्पन्न झालेली सवत्स धेनु म्हणजे ” सुरभि “. हीच गोमातांची अधिदेवता आहे. दिवाळीत हिचे पूजन केले जाते. एरवी सुद्धा ‘ गो-ग्रास ‘ म्हणून पोळी-भाताचा नैवेद्य काढून ठेवला जातो. वसुबारस तर काय गायींचाच उत्सव त्यामुळे या दिवशी तिचे विशेष कौतुक होते.
यानिमित्ताने प्राण्यांचे रक्षण करणे, निसर्गाच्या प्रती ऋण व्यक्त करणे हा मुख्य संदेश दिलेला आहे. हाच या सणामागचा मुख्य उद्देश आहे. अनेक उपकारक प्राण्यांचे ऋण आपण व्यक्त करतो, त्यातलाच हा एक दिवस. या दिवशी गायींचा गोठा स्वच्छ करून रंगवतात. तिथे पणत्या लावतात. मुख्य म्हणजे गायींना ओवाळून नैवेद्य देतात. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. ग्रामीण भागात या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गायीसमोर गाणी म्हटली जातात. गाण्यांमधून गाईच्या गुणांचे, शेतीच्या कामांचे वर्णन केलेले असते. या गाण्यांमधून एकमेकांना कोडी घालण्याचा खेळ खेळला जातो.
कृतज्ञता व्यक्त करणे हा आपल्या भारतीय संस्कृतीचा स्थायीभाव आहे. वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने निसर्गाचे पूजन करून त्याच्या प्रती ऋण व्यक्त केले जाते. आपला देश हा कृषिप्रधान देश आहे आपल्या संस्कृतीत गाई-वासरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या निसर्गातील प्राणिमात्रांचे रक्षण केले पाहिजे. कोणत्याही कारणाने, कोणत्याही प्रकारे निसर्गाला हानी पोहोचवायची नाही. ध्वनी-वायू प्रदूषण रोखले पाहिजे. निसर्गाचे रक्षण, संवर्धन केलं पाहिजे. हा संदेश या सणातून घ्यायचा आहे. निसर्ग संवर्धन मोहीम, वसुंधरा महोत्सव या अभियानांचे हेच उद्दिष्ट आहे. ” निसर्ग धरतीचे लेणे हो ! त्यांचे रक्षण करणे हो !!” हे कायम स्मरणात ठेवायला हवे.
तेव्हा या निमित्ताने आपण पुन्हा निसर्गाच्या जास्ती जवळ जाऊया. त्याच्याशी आपले नाते पुन्हा घट्ट करूया. दिवाळीची सुरुवात आनंदाची करूया.