मराठी साहित्य – विविधा ☆ रामाची निर्मल सीता व लक्ष्मी! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

😅 रामाची निर्मल सीता व लक्ष्मी! 😅 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“काय पंत आज तुमच्या घरातून t v चा आवाज नाही आला सकाळ पासून नेहमी सारखा.”

“अरे वैताग आणला आहे नुसता या tv वाल्यांनी!”

“काय केबल गेली की काय तुमची?”

“अरे केबलला काय धाड भरल्ये?  व्यवस्थित चालू आहेत सगळे चॅनेल्स.”

“मग तुमचा सखा सोबती आज मुका कसा?”

“अरे काय सांगू तुला, कुठलेही चॅनेल लावा सगळीकडे बजेट, बजेट आणि फक्त बजेट!  दुसरा विषयच नाही या लेकांना. नुसता उच्छाद आणलाय सगळ्या चॅनेलवाल्यांनी.”

“पंत, बजेट हाच सध्याचा गरम विषय आहे आणि त्यावर हे चॅनेलवाले आपली पोळी भाजून घेत असतील तर त्यात नवल ते काय?”

“तू म्हणतोस ते बरोबर आहे रे मोरू,  पण ज्यांना “अर्थसंकल्प” हा  शब्द सुद्धा नीट उच्चारता देखील येत नाही, असे लोक वायफळ चर्चा करून आपल्याला अर्थकारण समजावणार? “

“पंत, सध्या दिवसच तसे आलेत, त्याला आपण तरी काय करणार?”

“काय करणार म्हणजे, सरकारचा रिमोट जरी दिल्लीवरून चालत असला, तरी आपल्या t v चा रिमोट आपल्या हातातच असतो ना? मग ती वायफळ चर्चा ऐकण्यापेक्षा केला t. v. बंद!”

“पण पंत त्यात तुमचेच नुकसान नाही का?”

“त्यात कसले बुवा माझे नुकसान? उलट आता बजेटच्या आधीच विजेचे दर वाढलेत, मग t v बंद करून मी एक प्रकारे पैशाची बचतच नाही का करतोय?”

“पण पंत सरकारने कर सवलत किती दिली?  काय काय स्वस्त होणार? काय महाग होणार हे तुम्हाला कसे कळेल?”

“कसं म्हणजे, पेपर मधून, जो मी रोज सकाळी वाचायच्या आधी तूच लंपास करून वाचतोस!”

“काय पंत मी…. “

“अरे मस्करी केली मी तुझी. बर ते सगळे सोड, पण तुला माहीत आहे का, बजेट हा शब्द कुठून आला ते?”

“नाही खरच माहीत नाही पंत, मला कळायला लागल्या पासून अर्थसंकल्पाला इंग्रजी मधे बजेट म्हणतात एव्हढेच ठाऊक आहे!”

“तुला सांगतो ‘बजेट’ या शब्दाची निर्मिती फ्रेंच शब्द ‘बुजेत’ शब्दा पासून झाली. या शब्दाचा अर्थ ‘चामड्याची पिशवी’ असा होतो. फ्रेंच मंडळी पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी चामड्याच्या पिशवीचा पूर्वी वापर करीत असत आणि या पिशवीला ते तेंव्हा ‘बुजेत’ असे म्हणत. पण अर्थशंकल्पला बजेट हा शब्द प्रचलित होण्या मागे एक गमतीदार किस्सा आहे बघ मोरू!”

“कोणता किस्सा पंत?”

 “अरे १७३३ साली इंग्लंडचे माजी अर्थमंत्री सर रॉबर्ट वॉलपोल वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यासाठी त्यांच्या संसदेत आले होते. येताना त्यांनी स्वत:सोबत एक चामड्याची पिशवी देखील आणली होती. याच पिशवीत त्यांनी अर्थसंकल्पाचे कागदपत्र ठेवले होते. ती पिशवी उघडतांना  त्यांनी ‘बुजेत इज ओपन’ असे म्हटले. परंतु ‘बुजेत’ हा शब्द त्यांनी अशा प्रकारे उच्चारला की सभागृहातील इतर मंडळींना तो ‘बजेट’ असा ऐकू आला. मग काय, तेव्हापासून जगभरात बजेट हाच शब्द प्रचलित झाला.”

“पंत, फारच मनोरंजक आहे हा बजेट शब्दाचा इतिहास. बजेट शब्दा बद्दल तुम्हाला इतकी माहिती आहे, पण खऱ्या बजेट मध्ये तुम्हाला खरच इंटरेस्ट नाही याचेच जरा नवल….. “

“अरे इंटरेस्ट असला काय आणि नसला काय, रोजच्या खर्चाची तोंडमिळवणी करणे भाग आहे ना? आणि मला असे एक तरी उदाहरण सांग ना, की अमुक एका बजेट नंतर अमुक तमुक गोष्टींच्या किमती खाली आल्या म्हणून?”

“तसच काही नाही, काही काही गोष्टी खरच स्वस्त…… “

“होतात, होतात पण तात्पुरत्या, परत ये रे माझ्या मागल्या. नंतर तुझ्या माझ्या सारख्या सामान्य माणसाला त्याची सवय होवून जाते!  You know,  public memory is very short.”

“हो, पण पंत आपल्या बजेटची साऱ्या जगात चर्चा होते आणि……”

“त्याचा जागतिक अर्थकारणावर परिणाम होतो वगैरे, वगैरे, असेच ना? अरे मोरू म्हणून बजेट वाचतांना कविता वाचून आणि कथा सांगून कितीही साखरपेरणी केली, तरी प्रत्यक्ष महागाईचा सामना करतांना सामान्य माणसाचे  तोंड कडवट होतेच, त्याचे काय? “

“तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे पण…… “

“पण बिण सगळे सोड, मला एक सांग, आपण कितीही संकल्प केले तरी आपल्या खिशातल्या अर्थाला ते झेपायला नकोत का? अरे आपल्या घरचे महिन्याचे बजेट  सांभाळतांना घरच्या फायनान्स मिनिस्टरची काय हालत होते हे तुला मी वेगळे सांगायची गरज आहे का?”

“हो बरोबर, या बाबतीत सगळ्याच आपल्या घरातल्या फायनान्स कम होम मिनिस्टरनां माझा सलाम! महागाईचा कितीही भडका उडाला तरी घरातले बजेट सांभाळणे त्याच  जाणोत! पंत पटल बुवा तुमच म्हणण.”

“पटल ना, मग आता आमचा तू नेलेला आजचा पेपर आणून दे बरं मुकाट, कारण t v बंद केल्याने तोच आता माझा सखा सोबती!”

“तरी पण तुमच्या सारख्या सिनियर सिटीझनने “बुजेत” मध्ये इंटरेस्ट न दाखवणे मला काही पटत नाही.”

“अरे त्यात न पटण्या सारखं काय आहे. सगळ्या बजेट मधे तेच तेच तर असत. एका हाताने दिल्या सारखे करायचे आणि दुसऱ्या दहा मार्गानी दोन हातांनी काढून घ्यायच! आता तो आकडयांचा खेळ खरंच नकोसा वाटायला लागलाय रे! अरे पूर्वी लाखावर किती शून्य सांगताना दमछाक व्हायची आणि बजेटचे सगळे आकडे लाख करोड मधे!  मग माझ्यासारख्या पामराचे काय होईल याची तू कल्पनाच केलेली बरी.”

“पंत, तरी पण माझा मुख्य प्रश्न उरतोच ना!”

“तू तसा ऐकण्यातला नाहीस माहित आहे मला. मोरू आता तुला शेवटचे एकच सांगतो, निर्मल मनाच्या कुठल्याही रामाच्या सीतेने जरी अर्थसंकल्प मांडला, तरी त्याला त्या त्या वेळचे विरोधक नांवच ठेवणार आणि त्या त्या वेळचे राज्यकर्ते मांडलेल्या बजेटची प्रशंसाच करणार, हा आजपर्यंतचा इतिहास आणि अलिखित नियमच आहे! त्यामुळे बजेट चांगले का वाईट या फ़ंदात न पडता, घरातले “बुजेत” सांभाळणाऱ्या घरच्या लक्ष्मीला माझे शतशः प्रणाम!”

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गीता जशी समजली तशी… – गीता शास्त्र – भाग – ६ ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

☆ गीता जशी समजली तशी… गीता शास्त्र  – भाग – ६ ☆ सौ शालिनी जोशी

गीताशास्त्र

गीतेचा प्रत्येक शब्द जेवढा त्या काही आचरणी होता, तेवढा आजही आहे. कारण काळ बदलला तरी माणसाचा स्वभाव बदलत नाही. अर्जुनाला निमित्त्य करून भगवंतांना चिंता आहे सर्व मानव जातीच्या कल्याणाची. त्या दृष्टीने आवश्यक सर्व शास्त्रांचा समावेश गीतेत आहे. म्हणून गीतेला ‘सर्व शास्त्रांचे माहेर’ म्हणतात. जीवनाला प्रेरणा व योग्य मार्ग देणारा प्रत्येक विचार म्हणजे शास्त्र.

गीता हे नीती प्रधान भक्तीशास्त्र, आचरण शिकवणारे कर्मशास्त्र, ज्ञानाचा अनुभव देणारे अध्यात्मशास्त्र, संयम शिकवणारे योगशास्त्र आहे. अशा प्रकारे कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती यांचा समन्वय येथे आहे. सर्व शास्त्रे येथे एकोप्याने नांदतात. कोणाची निंदा नाही. कोणाला कमी लेखले नाही. अधिकाराप्रमाणे आचरण्याचा उपदेश आहे.

गीता हे खचलेल्या मनाला उभारी देणारे आणि मन बुद्धीचा समतोल साधणारं मानसशास्त्र आहे. योग्य व सात्विक आहार यांचे महत्त्व आणि फायदे सांगणारे आहार शास्त्र आहे. त्याचबरोबर राजस व तामस आहाराचे तोटेही सांगितले आहेत. युक्त आहार, विहार, झोप आणि जागृती यांचे फायदे सांगणार आचरणशास्त्र आहे. त्याचबरोबर अति खाणाऱ्याला किंवा अजिबात न खाणाऱ्याला, अती झोपणाऱ्याला किंवा अजिबात न झोपणाऱ्याला योग साध्य होत नाही असेही गीता सांगते म्हणजे कसे असावे आणि कसे असू नये हे दोन्ही सांगणारे तारतम्य शास्त्र आहे.

ज्येष्ठांना त्यांच्या जबाबदारीची आणि समाजातील सर्व घटकांना (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य शूद्र )त्यांची कर्तव्य सांगणारे, सर्व जातींना व स्त्रियांना समान लेखणारं समाजशास्त्र आहे. समाजातील उच्चपदस्थ जे जे आचरण करतात त्याला प्रमाण मानून इतरलोका आचरण करतात हा समाजशास्त्राचा महान सिद्धांत येथे सांगितला आहे.

गीता हे पंचभुतात्मक सृष्टीचे ज्ञान करून देणारे विज्ञान शास्त्र आहे. यालाच गीता अपरा प्रकृती म्हणते. भूमि, आप, अनिल, वायु, आकाश, मन, बुद्धी, अहंकार ही तिची आठ अंगे. यातच सगळी भौतिकशास्त्रे सामावली आहेत. ‘उतिष्ठ, युद्धस्व’ असे सांगून प्रसंगाला धैर्याने तोंड देण्यास सांगणार हे विवेक शास्त्र आहे. स्वधर्माची व स्व कर्तव्याची जाणीव करून देऊन त्याप्रमाणे वागण्याची प्रेरणा गीता देते. कामक्रोधादि पतनापर्यंत नेणाऱ्या अंत: शत्रूंचा निषेध गीता करते. याशिवाय अक्षय सुखाची प्राप्ती करून देणारे हे आत्मशास्त्र आहे.

‘उद्धरेदात्मनात्मानं ‘ हा स्वावलंबनाचा मंत्र गीता देते. यज्ञ, ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, सुख प्रत्येकाचे गुणाप्रमाणे भेद सांगून सात्विकतेला महत्त्व देते. फलासक्तीचा त्याग, संयम, विवेक यांनी शुद्ध क्रिया गीतेला अपेक्षित आहेत. म्हणून ग्राह्य आणि अग्राह्य ( दैवी आणि आसुरी गुण) गीता समोर ठेवते. अग्राह्य गोष्टींचा त्याग का करावा हे पटवून देते. गीतेला सक्ती मान्य नाही. अंधश्रद्धेला वाव नाही. ‘ यथेच्छसि तथा कुरु ‘असे स्वातंत्र्य गीता देते. गीतेत कोणतेही कर्मकांड नाही. स्वधर्म हाच यज्ञ आणि स्वकर्म हाच धर्म म्हणून स्वकर्मानेच ईश्वराची पूजा. अशा प्रकारे गीता आहे जीवनाचे एक रहस्य पूर्ण शास्त्र आहे.

गीतेचा अभ्यास तरुणांनी अवश्य करावा. त्यांच्यासाठी ज्ञान मिळवण्याचे ते तीन मार्ग गीता सांगते. ‘तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवयाl’ ( ४/३४). ज्ञानी गुरूला साष्टांग नमस्कार (नम्रता) प्रश्न विचारणे (शंका निरसन) आणि सेवा (अहंकार गलीत) केल्याने त्यांचे कडून ज्ञान प्राप्ती होते. अशा प्रकारे तरुणांपासून सर्वांना मार्ग दाखवणारे शास्त्र. म्हणून गीता महात्म्यातील पहिला श्लोक सांगतो

गीताशास्त्रमिदं पुण्यं य: पठेत् प्रयत: पुमान्l

विष्णो: पदमवाप्नोति भयशोकादिवर्जित:ll

गीता हे पुण्यमय शास्त्र आहे. त्याच्या चिंतनाने भयशोकादि उर्मीतून मुक्त होऊन माणसाला विष्णूपदाची प्राप्ती होते. त्यानुसार आचरण करणारा पूर्ण सुखाला प्राप्त होतो. अशाप्रकारे संसार मोक्षदृष्ट्या कसा केला पाहिजे व मनुष्याचे संसारातील खरे कर्तव्य काय हे तात्विक दृष्ट्या उपदेश करणारे गीता शास्त्र आहे. केवळ म्हातारपणी वाचण्यासाठी किंवा संसार त्याग करण्यासाठी नाही. तरुण वयात अभ्यासाला केलेली सुरुवात आयुष्यभर दीपस्तंभ होते.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्रतोपासना – ९. पशू पक्षी यांचा आदर करावा ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

व्रतोपासना – ९. पशू पक्षी यांचा आदर करावा ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आपण ज्या पृथ्वीवर रहातो तेथे मानव एकटाच नसतो. पृथ्वीवर जी जीवसृष्टी आहे त्यातील माणूस हा एक प्राणी आहे. माणूस बुध्दीने सर्वश्रेष्ठ असल्याने सर्वांच्या वरचढ ठरला आहे. तसे पाहिले तर इतर प्राण्यांच्या कडे जे आहे त्यातील काहीच माणसाकडे नाही. पण आपल्या बुद्धीच्या बळावर तो सर्वांना ताब्यात ठेवू शकतो. प्राण्यांच्या ठायी असलेल्या शक्ती मशिन द्वारे प्राप्त करतो. खरे तर सर्व पशू पक्षी निसर्गात महत्वाचे असतात. ते निसर्गाचा समतोल राखतात. त्यांच्या मुळे निसर्गाचे संवर्धन होते. या मुळे आपले जीवन समृध्द होते. निसर्गाचे चक्र अव्याहत चालू रहायचे असेल तर हे पशू, पक्षी, कीटक, वृक्ष, नद्या, डोंगर आवश्यक आहेत. परंतू हे लक्षात न घेता माणसाने आपल्या बुद्धीचा स्वार्थी व बेबंद वापर केला तर माणसाचीच सर्वात जास्त हानी होणार आहे. ज्या जीवसृष्टीच्या आधारे माणूस सुखात जगत असतो, ज्यांच्या आधाराने जगत असतो त्यांचे आपण ऋणी असले पाहिजे. ही साधी माणुसकी आहे.

या विषयी भारतीय संस्कृतीने उच्च आदर्श जपला आहे. श्राद्ध या कृतज्ञता विधीमध्ये धर्मपिंड दिले जाते. ते सर्व पशू, पक्षी, वृक्ष, नद्या, पर्वत ज्या सर्वांनी आपल्याला पोसले त्या सर्वांना हे धर्मपिंड असते.

कोणीही कितीही श्रेष्ठ असेल, बुद्धिवादी असेल तरी कोणालाही क्षुद्र म्हणून हिणवू नये, निंदा करू नये, लाथाडू नये. या निसर्गा पुढे नम्र व्हावे. आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

९/११/२०२४

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ४१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ४१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- इथं कोल्हापूरात लहान वयाच्या पेशंटना देवधर डागतरकडंच आणत्यात समदी. माज्या रिक्षाच्या तर रोज चार-पाच फेऱ्या हुत्यात. म्हनून तर सवयीनं त्येंच्या दवाखान्याम्होरंच थांबलो बगा.. ” तो चूक कबूल करत म्हणाला. पण…. ?

 पण ती त्याची अनवधानानं झालेली चूक म्हणजे पुढील अरिष्टापासून समीरबाळाला वाचवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न होता हे सगळं हातातून्या निसटून गेल्यानंतर आमच्या लक्षात येणार होतं… !!)

डॉ. जोशींच्या हॉस्पिटलमधे गेलो त्याआधीच आपलं काम आवरून रिसेप्शनिस्ट घरी गेलेली होती. हॉस्पिटलमधे एक स्टाफ नर्स होती. तिने ‘डॉक्टर अर्जंट मीटिंगसाठी राऊंड संपवून थोड्याच वेळापूर्वी गेलेत, आता उद्याच येतील’ असे सांगितले. आम्ही इथे तातडीने येण्याचे प्रयोजन तिला सांगताच तिने आम्हाला एका रूममधे बसवले. लगबगीने बाहेर गेली. ती परत येईपर्यंतची पाच दहा मिनिटेही आमचं दडपण वाढवणारी ठरत होती. ती येताच तिने बाळाला अॅडमिट करून घ्यायच्या फॉर्मलिटीज पूर्ण केल्या.

“डॉक्टर कधी येतायत?”

मी उतावीळपणे विचारले.

डॉक्टर सपत्निक केशवराव भोसले नाट्यगृहात नाटक पहायला गेले होते हे नर्सला असिस्टंट डॉक्टरशी बोलल्यावर समजले होते. समीरच्या केसबद्दल त्याच्याशी डॉक्टरांची जुजबी चर्चा झालेली होती. त्यानुसार त्याने दिलेल्या सूचनेप्रमाणे नर्सने तातडीने समीरबाळाला सलाईन लावायची व्यवस्था केली.

डाॅ. जोशी दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे राऊंडला आले. समीरला तपासताना असिस्टंट डॉक्टरही सोबत होते. आम्हाला औषधांचं प्रिस्क्रिप्शन त्यांनी लिहून दिलं.

“दोन दिवस सलाईन लावावं लागेल. या औषधाने नक्कीच फरक पडेल. डोण्ट वरी. “

आम्हाला धीर देऊन डाॅक्टर दुसऱ्या पेशंटकडे गेले. योग्य निर्णय तातडीने घेतल्याचं ‌त्या क्षणी आम्हाला मिळालेलं समाधान कसं भ्रामक होतं हे आमच्या लक्षात यायला पुढे आठ दिवस जावे लागले. दोन दिवसांपुरतं लावलेलं सलाईन चार दिवसानंतरही सुरू ठेवल्याचं पाहून आमच्या मनात कुशंकेची पाल चुकचुकली खरी पण त्यातलं गांभीर्य तत्क्षणी जाणवलं मात्र नव्हतं. अलिकडच्या काळात सलाईन लावताना एकदा शीर सापडली की त्या शीरेत ट्रीटमेंट संपेपर्यंत कायमच एक सुई टोचून ठेवलेली असते. त्यामुळे सलाईन बदलताना प्रत्येकवेळी नव्याने शीर शोधताना होणारा त्रास टाळला जातो. पण त्याकाळी ही सोय नसे. त्या चार दिवसात प्रत्येक वेळी सलाईन बदलायच्या वेळी शीर शोधताना द्याव्या लागणाऱ्या टोचण्यांमुळे असह्य वेदना होऊन समीरबाळ कर्कश्श रडू लागे. त्याचं ते केविलवाणेपण बघणंही आमच्यासाठी असह्य वेदनादायी असायचं. बॅंकेत मित्रांसमोर मन मोकळं केलं तेव्हा झालेल्या चर्चेत तातडीने सेकंड ओपिनियन घ्यायची निकड अधोरेखित झाली. डाॅ. देवधर हाच योग्य पर्यायही पुढे आला पण ते काॅन्फरन्सच्या निमित्ताने परगावी गेले होते. सुदैवाने आमच्या एका स्टाफमेंबरच्या बहिणीने नुकतीच पेडिट्रेशियन डिग्री मिळाल्यावर डाॅ. देवधर यांच्याच मार्गदर्शनाखाली राजारामपुरीत स्वत:चं क्लिनिक सुरु केल्याचं समजलं. मी तिला जाऊन भेटलो. माझ्याजवळची फाईल चाळतानाच तिचा चेहरा गंभीर झाल्याचे जाणवले.

” मी डाॅ. देवधर यांच्याशी संपर्क साधते. ही वुईल गाईड अस प्राॅपरली. “

पुढे हे प्रोसेस पूर्ण होईपर्यंत एक दिवस निघून गेला. आम्ही डिस्चार्जसाठी डाॅ. जोशीना विनंती केली तेव्हा ते कांहीसे नाराज झाल्याचे जाणवले.

“तुम्ही ट्रीटमेंट पूर्ण होण्याआधीच डिस्चार्ज घेणार असाल तर स्वतःच्या जबाबदारीवर घेणार आहात कां? तसे लिहून द्या आणि पेशंटला घेऊन जावा. पुढे घडणाऱ्या कोणत्याही गोष्टीला मी जबाबदार रहाणार नाही” त्यांनी बजावले.

पुढे डॉ. देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ट्रीटमेंट चालू झाली तरी आधीच डॉ. जोशींमुळे स्पाॅईल झालेली समीरची केस त्याचा शेवट होऊनच फाईलबंद झाली. केस स्पाॅईल कां आणि कशी झाली होती ते आठवणं आजही आम्हाला क्लेशकारक वाटतं. समीरच्या अखेरच्या दिवसांत देवधर डॉक्टरांच्याच सल्ल्याने त्याला पुढील उपचारांसाठी पुण्याला केईएम हॉस्पिटलमधे रातोरात शिफ्ट केल्यानंतर त्याचं ठरलेलं ऑपरेशन होण्यापूर्वीच त्याने शेवटचा श्वास घेतला होता!!

घरी आम्हा सर्वांसाठीच तो अडीच तीन महिन्यांचा काळ म्हणजे एक यातनापर्वच होतं!

पण या सर्व घटनाक्रमामधे लपलेले अघटिताचे धागेदोरे अलगद उलगडून पाहिले की आश्चर्याने थक्क व्हायला होतं!माझे बाबा १९७३ साली गेले ते इस्लामपूरहून पुण्यात शिफ्ट केल्यानंतर तिथल्या हाॅस्पिटलमधेच. २६सप्टे. च्या पहाटे. तिथी होती सर्वपित्री अमावस्या. समीरचा मृत्यू झाला तोही त्याला रातोरात पुण्याला शिफ्ट केल्यानंतर तिथल्या हाॅस्पिटलमधेच. तोही २६सप्टें. च्या पहाटेच. आणि त्या दिवशीची तिथी होती तीही सर्वपित्री अमावस्याच! हे थक्क करणारे साम्य एक अतर्क्य योगायोग असेच आम्ही गृहित धरले होते. शिवाय घरी आम्ही सर्वचजण विचित्र दडपण आणि प्रचंड दु:खाने इतके घायाळ झालेलो होतो की त्या योगायोगाचा विचार करण्याच्या मनस्थितीत आम्ही नव्हतोही. पण त्याची उकल झाली ती अतिशय आश्चर्यकारकरित्या आणि तीही त्यानंतर जवळजवळ पंधरा वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर आणि तेही अशाच एका चमत्कार वाटावा अशा घटनाक्रमामुळे. ते सर्व लिहिण्याच्या ओघात पुढे येईलच.

समीरच्या आजारपणाचा हा तीन महिन्यांमधला आमचा आर्थिक, भावनिक, मानसिक आणि शारीरिक अस्वास्थ्य अशा सर्वच पातळ्यांवरचा आमचा संघर्ष आम्ही अथकपणे निभावू शकलो ते आम्हा सर्व कुटु़बियांच्या ‘त्या’च्यावरील दृढ श्रध्दा आणि निष्ठा यामुळेच! ‘तो’ बुध्दी देईल तसे निर्णय घेत राहिलो, या संघर्षात लौकिकार्थाने अपयश आल्यासारखे वाटत असले तरी तोल जाऊ न देता समतोल विचारांची कास कधी सोडली नाही. त्यामुळेच कदाचित आमच्या दु:खावर ‘त्या’नेच हळुवार फुंकर घातली तीही अगदी ध्यानीमनी नसताना आणि त्यासाठी ‘त्या’ने खास निवड केली होती ती लिलाताईचीच! तो क्षण हा ‘तो’ आणि ‘मी’ यांच्यातील अनोख्या नात्यातला एक तेजस्वी पैलू अधोरेखित करणारा ठरला आणि म्हणूनच कायम लक्षात रहाणाराही!

समीर जाऊन पंधरा दिवस होऊन गेले होते. आरतीची मॅटर्निटी लिव्ह संपल्यानंतर त्यालाच जोडून बाळाच्या आजारपणासाठी तिने घेतलेली रजाही तो गेल्यानंतर आठवड्याभरात संपणार होती. पण आरती पूर्णपणे सावरली नसल्याने घराबाहेरही पडली नव्हती. रजा संपताच ती बँकेत जायला लागावी तरच ती वातावरण बदल होऊन थोडी तरी सावरली जाईल असं मलाही वाटत होतं पण ती तिची उमेदच हरवून बसली होती. मीही माझं रुटीन सुरू केलं होतं ते केवळ कर्तव्याचा भाग म्हणूनच. कारण या सर्व धावपळीत माझं बॅंकेतल्या जबाबदाऱ्यांकडे आधीच खूप दुर्लक्ष झालं होतं. स्वतःचं दुःख मनात कोंडून ठेवून ड्युटीवर हजर होण्याशिवाय मला पर्यायही नव्हताच. रोज घरून निघतानाही पूत्रवियोगाच्या दुःखात रुतून बसलेल्या आरतीच्या काळजीने मी व्याकुळ व्हायचो. त्यामुळे मनावरही प्रचंड दडपण असायचं आणि अनुत्साहही.. !

अशा वातावरणातला तो शनिवार. हाफ डे. मी कामं आवरुन घरी आलो. दार लोटलेलंच होतं. दार ढकलून पाहिलं तर आरती सोफ्यावर बसून होती आणि दारात पोस्टमनने शटरमधून आत टाकलेलं एक इनलॅंडलेटर. ते उचलून पाहिलं तर पाठवणाऱ्याचं नाव आणि पत्ता… सौ. लिला बिडकर, कुरुंदवाड!

ते नाव वाचलं आणि मनातली अस्वस्थता क्षणार्धात विरूनच गेली. एरवी तिचं पत्र कधीच यायचं नाही. तसं कारणही कांही नसायचं. मी नृसि़हवाडीला जाईन तेव्हा क्वचित कधीतरी होणाऱ्या भेटीच फक्त. जी काही ख्यालीखुशाली विचारणं, गप्पा सगळंं व्हायचं ते त्या भेटीदरम्यानच व्हायचं. म्हणूनच तिचं पत्र आल्याचा आनंद झाला तसं आश्चर्यही वाटलं. मुख्य म्हणजे माझा घरचा हा एवढा संपूर्ण पत्ता तिला दिला कुणी हेच समजेना.

मी घाईघाईने ते पत्र फोडलं. वाचलं. त्यातला शब्द न् शब्द आम्हा उभयतांचं सांत्वन करणारा तर होताच आणि आम्हाला सावरणाराही. त्या पत्रातलं एक वाक्य मात्र मला मुळापासून हादरवणारं होतं!

‘समीरचा आजार पृथ्वीवरच्या औषधाने बरा होण्याच्या पलिकडे गेलेला असल्याने तो बरा होण्यासाठी देवाघरी गेलाय आणि तो पूर्ण बरा होऊन परत येणाराय या गोष्टीवर तू पूर्ण विश्वास ठेव. आरतीलाही सांग. आणि मनातलं दुःख विसरून जा. सगळं ठीक होणाराय. ‘

समीरच्या संपूर्ण आजारपणात मी घरच्या इतरांपासूनच नव्हे तर आरती पासूनही लपवून ठेवलेली एकच गोष्ट होती आणि ती सुद्धा त्यांनी उध्वस्त होऊ नये म्हणून. समीर जिवंत राहिला तरी कधीच बरा होणार नव्हता. हे कां ते डॉ. देवधर यांनी मला अतिशय सौम्यपणे समजून सांगितलेलं होतं आणि त्या प्रसंगी एकमेव साक्षीदार होते त्यादिवशी डॉक्टरांच्या केबिनमधे माझ्यासोबत असणारे माझे ब्रॅंच मॅनेजर घोरपडेसाहेब! ‘समीरचा आजार पृथ्वीवरच्या औषधाने बरा होण्याच्या पलिकडे गेलेला होता’ ही तिसऱ्या कुणालाही माहित नसलेली गोष्ट लिलाताईपर्यंत पोचलीच कशी याचा उलगडा तिला समक्ष भेटल्यानंतरच होणार होता आणि ‘समीर बरा होऊन परत येणाराय’ या तिच्या भविष्यवाणीत लपलेल्या रहस्याचाही! पण तिला समक्ष जाऊन भेटण्याची गरजच पडली नाही. तिच्या पत्रात लपलेल्या गूढ अतर्क्याची चाहूल लागली ती त्याच दिवशी आणि तेही अकल्पितपणे!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नयन जादूगार… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

☆ नयन जादूगार…  ☆ सौ शालिनी जोशी

डोळे हे कवी मनाचा आवडता विषय. अनेक अजरामर काव्यातून डोळ्यांविषयी गोड संवेदना व्यक्त झाल्या. कोणी म्हणतात ‘डोळे हे जुलमीगडे‘, तर कोण म्हणते ‘डोळ्यात वाच माझ्या ‘, क्षणभर उघड नयन’, हे नयन बोलले काहीतरी, नयन तुझे जादूगार, जे स्वप्न भाव वेडे नयनी मूर्त होते, रूप पाहता लोचनी, डोळे मोडीत राधा चाले, ही आणि यासारखी अनेक गाणी भावभावना व्यक्त करण्यासाठी डोळ्यांचा उपयोग करतात. म्हणजे नुसते बघणे एवढाच डोळ्यांचा उपयोग नसून मनातील भाव व्यक्त करण्याचे ते साधन. मनाचा आरसाच ! कधी प्रेम कधी ममता, माया, भक्ती, निरागसता, डोळ्यातून व्यक्त होते. असे शब्दविण संवाद साधणारे हे डोळे राग, लोभ, द्वेष, मोह, मत्सरही व्यक्त करतात. कुतूहलाने टकमक बघतात. रागाने वटारतात. क्रोधाने लाल होतात. आश्चर्याने मोठे होतात. नुसत्या नजरेने हात न उचलता एखाद्याकडे संकेत करता येतो. हेच डोळे कधी मादक, कधी लाजरे, कधी प्रेमळ, कधी निष्टुर, कधी लबाड तर कधी पाणीदार, सतेज, निष्पाप असतात.

असे हे विविध ढंगी डोळे तसे त्याचे रंग आणि आकार ही विविध. कोणाचे घारे तर कुणाचे काळे, निळसर किंवा तपकिरी. डोळ्याच्या रंगानुसार माणसाचा स्वभाव बदलतो. म्हणून घाऱ्या डोळ्याची माणसे लबाड असतात. प्रदेशानुसारही डोळ्यांचा आकार व ठेवण बदलते. तिबेटी लोकांचे डोळे बारीक असतात तर काही लोकांचे डोळे गोल, काहींचे बटबटीत, तर काहींचे लांबट असतात. डोळ्याला निरनिराळे प्रतिशब्द ही आहेत चक्षु, नयन, अक्ष, लोचन.

तसेच डोळा हा नुसता शरीराचा अवयव नाही. तर सौंदर्याचा मापदंड. म्हणून कमलाक्षी, कमलनयना, मृगनयना, मृगाक्षी असे याचे वर्णन करतात. नृत्यांमध्येही शरीराच्या हालचाली इतकेच डोळ्यांच्या हालचालीला महत्त्व आहे. डोळ्यांच्या नजरेच्या स्थितीवरून ध्यानाचेही प्रकार होतात खेचरी, भूचरि, साचरी, आणि अगोचरी. नाक, कान आपल्याला बंद करता येत नाही पण डोळे स्वच्छेने पापण्यांच्या संपुटात बंद होतात आणि मग माणूस बाह्य जगापासून अलिप्त होतो त्यामुळे एकांतात मनाशी व परमेश्वराची ऐक्य साधता येते.

डोळ्यावरून तयार झालेले कितीतरी म्हणी व वाक्प्रचार आपण वापरतो. उदाहरणार्थ – आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन, डोळ्यात अंजन घालणे, डोळ्यात तेल घालून बघणे, डोळ्यात प्राण आणणे, डोळे झाक करणे, डोळे भरून पाहणे, डोळे पांढरे होणे इत्यादी.

असे हे डोळे ज्याच्यामुळे आपण साऱ्या जगाच्या सौंदर्याचा, आनंदाचा, दुःखाचा, ज्ञानाचा अनुभव घेतो पण ज्याला डोळेच नसतात किंवा कार्य करण्यास सक्षम नसतात ते या सर्वाला मुकतात. बाह्य जगाशी संपर्क डोळ्याकडून तुटला तरी त्यांचे मनोधैर्य त्यांना मार्ग दाखवते. त्यांचे अंतःचक्षु इतके प्रखर असतात की डोळसालाही लाजवेल असे ज्ञान त्यांना प्राप्त होते. उदाहरणार्थ प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज. आता नेत्रदानामुळे अंधानाही दृष्टी येणे शक्य झाले आहे. ब्रेल लिपीमुळे शिक्षणाचे द्वार त्यांच्यासाठी खुले झाले आहे. एकंदरीत दृष्टी तेथे सृष्टी मग ती बाह्य असो अंतर असो.

सर्व भावना आपल्या पोतडीत लपवणारे व प्रसंगानुरू व्यक्त करणारे जादूगारच हे डोळे म्हणूनच म्हणतात, ‘डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे’.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आनंदे भरीन तिन्ही लोक… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

🌸 विविधा 🌸

☆ आनंदे भरीन तिन्ही लोक… ☆ सौ. वृंदा गंभीर

अवघाचि संसार सुखाचा करिन

आनंदे भरीन तिन्ही लोक || १ ||

*

जाईन गे माये तया पंढरपुरा |

भेटण माहेरा आपुलिया || २ ||

*

सर्व सुकृताचे फळ मी लाहिन |

क्षेम मी देईन पांडुरंगा || ३ ||

*

बापरखुमादेवी वरु विठ्ठलाची भेटी |

आपुल्या सवंसाठी करुनि ठेला || ४ ||

अवघाची संसार सुखाचा करिन

आनंदे भरीन तिन्ही लोक ||1||

अवघाची संसार म्हणजे सगळा संसार सुखाचा करिन संसार खूप अवघड आहे तो सोपा नाही वादळ वारे संकट झेलत सावरत संसार करावा लागतो,,,,,,,,

कुटुंबाची मर्यादा पाळत सगळ्यांची मनं सांभाळून हातोटीने संसार करावा लागतो नव्हे नव्हे करावाच लागतो.

 “आनंदे भरीन तिन्ही लोक “

आनंदाने, समाधाने राहून तिन्ही लोकांना आनंद देईल,,,,

तिन्ही लोक,,, स्वर्ग, पाताळ, पृथ्वी या तिन्ही लोकांत आनंद परमेश्वराच्या नामस्मरणाने देणार आहे.

परमार्थ करून प्रपंच करणं म्हणजे संसार सुखाचा होणं आहे.

संसार अवघड आहे तितकाच परमार्थ सोपा आहे पण, आपण सांसाराच्या मागे धावत परमार्थ अवघड करून ठेवतो.

वय झाल्यावर देवाची आठवण येते तेंव्हा लक्षात येत आपण आयुष्यभर विनाकारण पळालो ज्याने आपल्याला या जगात आणलं त्यालाच विसरलो.

तेंव्हा जाणीव होते आणि देवाचा धावा सुरु होतो. भक्ती कशी निस्वार्थी हवी. देव “दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू ” आहे आपल्या भक्तीचं फळ तो लगेच देतो.

संसार करत आनंद देण्याचा प्रयत्न करावा आनंद वाटत राहावा.

जाईन गे माये तया पंढरपूरा* भेटेन माहेरा आपुलिया

संसार करत परमार्थ करायचा आहे पांडुरंगा चरणी लिन व्हायचं आहे..

पंढरपूर माहेर आहे तिथे विठ्ठल रुख्मिणी माय बाप कर कटावर ठेऊन उभे आहेत…..

पंढरपूला माझ्या माहेरी जाऊन भेटून येणार आहे माझ्या माय माऊली, माझ्या मात्या पित्याला डोळेभरून बघणार आहे त्याचं ते सकुमार रूप डोळ्यात साठवणार आहे.

“सावळा तो श्रीहरी, सावळा तो विठ्ठल

रूप त्याचे मनोहर, पाहुनी होई मन समाधान “

सुंदर असे रूप पाहून देहभान हरपून जाते,,,,,

“पिवळा पितांबर, गळ्यात तुळशीमाळा

भाळी चंदनाचा टिळा, कटेवरी हात उभा वेटेवर”

असा तो पांडुरंग डोळ्यात साठवून मनाला शांती मिळते म्हणून माझ्या माहेरी मला जायचं भेटून यायचं आहे.

सर्व सुकृताचे फळ मी लाहीन

क्षेम मी देईन पांडुरंगा

जे मी सत्कर्म केल जे पुण्य मी मिळवलं त्याचं फळ मला मिळेल किंवा मी ते घेऊन येईल मी पांडुरंगाची क्षमा मागेल,,,,,,

रोजचे कर्म करत असताना चूक होतेच अशी काही चूक झाली तर पांडुरंगाची क्षमा मागून प्रायश्चित घेईल,,,,,,

मी विठुराया चरणी नतमस्तक होईल,,,, विठुरायाला अलिंगन देऊन त्याच्या चरणी जागा दे ही विनवानी करेल त्याची दासी होऊन राहीन.

बापरखुमादेवी वरू विठ्ठलाच्या भेटी

आपुल्या संवसाठी करुनी ठेला

 विठ्ठल रुख्मिणी आई वडील आहेत.

माता पित्याची भेट हे विठ्ठलाच दर्शन म्हणजे एक वरदान आहे…..

आपल्या साठी तो विटेवर उभा आहे.

आपल्या रक्षणासाठी उभा आहे.

एक आषाढीची वारी निमित्य आहे आई बापाच्या भेटीचं संतांचा मेळा भरतो. संत संगत मिळते आणि आयुष्य बदलून जातं.

” दुमदूमली पंढरी, गजर कीर्तनाचा “

” मुखी नाम विठुरायाचे, सोहळा हरीनामाचा “

जय हरी माऊली 🙏🙏

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “नवीन वर्षाचा कागद…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “नवीन वर्षाचा कागद…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

खरंतर त्या कागदाबद्दल इतकं बोलण्यासारखं काहिच नव्हतं. पण एखादी गोष्ट उकरुन काढणे म्हणजे काय? याचा अनुभव परत एकदा आला. प्रत्येक काही दिवसांनी एक तिथी परत परत येते, तितक्याच सहजतेने हा उकरुन काढण्याचा अनुभव काही कालावधीनंतर परत येतोच. कधी तो येतो, तर काही वेळा आणण्यात आपणही मागे नसतो….. असो.

 लिहिलेल्या काही जुन्या कागदांना खूपच महत्त्व प्राप्त होतं. अर्थातच ते कोणी लिहिले, त्यात काय आहे, आणि कोणाच्या हाती लागले आहे यावर सुध्दा ते अवलंबून असतं. पण यांचं तसं नव्हतं…….

 माझ्या हस्ताक्षरातले असेच काही कागद घरातल्या अशा माणसाच्या हाती लागला, की त्याला महत्त्व येण्याऐवजी त्याचा विनोद झाला. आणि मग वाद……

 तुमच्या या कागदांना रद्दीत सुध्दा जागा नाही. असं म्हणत ते वाचले जात होते. अगदी तारीख आणि वर्ष यासकट.

 कागदावरच्या बऱ्याच गोष्टी सारख्याच असल्या तरी तारखेनुसार त्याच्यातलं अंतर एक वर्ष इतका मोठ्ठा काळ दाखवत होतं. म्हणजे वाढदिवस साजरा केला असता तर त्यातले काही कागद एकविस वर्षांचे सुद्धा झाले असते.

 यातही मी वर्षभरानंतर बऱ्याच गोष्टी तशाच लिहू शकतो, याच कौतुक न करता तेच तेच लिहिण्यात काय अर्थ? जे आपण करतच नाही……… असा उपहास होता. आणि अक्षराबद्दल तर एक अक्षर तोंडातून निघालं नाही. खरंतर माझ्या अक्षरावरून मी साक्षर आहे हे तिला मान्यच नाही.

 हा अक्षर, साक्षर, मधला क्ष, आणि गणितातला क्ष तेव्हापासूनच अक्षरशः माझ्या बाबतीत यक्षप्रश्न आहे.

 म्हणजे क्ष किरण यंत्राने काही गोष्टी समजतील. पण माझं लिहिलेलं समजणार नाही.

 आता एक वर्ष अंतर असणाऱ्या कागदावर काय वेगळं लिहिलेलं असणार….. नवीन वर्षात नियमितपणे करायच्या, आणि निग्रह करून सोडायच्या गोष्टी त्यात होत्या.

 यातल्या करायच्या गोष्टींचा निग्रह होत नव्हता, तर काही गोष्टी सोडल्याचा ग्रह मी करुन घेतला होता.

 ज्या गोष्टी करायच्या नाहीत ती व्यसनं आणि सवयी अर्थात वाईट सवयी आहेत असं इतरांच म्हणणं. आता हे इतर एकच असतील तरी त्यांचं म्हणणं हेच बहुमतासारखं असतं असं नाही, तर तेच बहुमत असतं यात शंका नाही……

 करायच्या काही गोष्टींमध्ये ज्या करायच्या होत्या त्याच्या विरुद्ध साहजिकच सोडायच्या होत्या. जसं सकाळी लवकर उठायचं म्हणजेच उशिरापर्यंत झोपणं सोडायचं होतं. ज्याला लोळत पडणं हा शब्द माझ्यासाठी घरात वापरला जातो.

 हळू आणि शक्यतो गोड आवाजात बोलायचं. म्हणजेच मोठ्याने बोलायचे तर नाहीच, पण बोलण्यातला ताठपणा सुद्धा सोडायचा हे ओघाने आलंच होतं. हे वाचतांना समोरचा आवाज उगाचच हुकूमशहा सारखा वाटला.

 नियमितपणे सूर्य नमस्कार घालणे. असंही त्यात होतं. नमस्कार करणे आणि घालणे यात फरक असतो. हे सुद्धा मला समजवून देण्यात आलं. आणि एक नमस्कार सुध्दा झाला. अगदी कोपरापासून. आता हा नमस्कार केला, की घातला हे मी ठरवेन…. पण नमस्कार करतेवेळी तेव्हाच तीच रुप मला सकाळच्या सूर्यासारखं तेजस्वी वाटलं……. आणि माझा चेहरा अस्ताला जाणाऱ्या सूर्यासारखा शांत वाटला……

 अन्न हे पूर्ण ब्रह्म…… उदर भरण नोहे……. याचा दाखला देत. जेवायला काय आहे? हे विचारायचं नाही. म्हणजेच जे मिळेल ते खायचं. आपल्या घरातलं चांगलच असतं. असं मीच लिहिलं होतं. पण…..

 हे वाचतांना त्यांचा रोख जिभेच्या पुरवलेल्या लाडामुळे माझ्या वाढलेल्या पोटाकडे होता.

 विकएंडला एकट्याने जायचं नाही. म्हणजेच जोडीने आणि गोडीने जायचं. हे फक्त लिहिलेलंच होत…… अंमलबजावणी व्हायची होती……

 म्हणजे वरच्या काही गोष्टी मी ठरवणार होतो, पण यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी करायलाच पाहिजेत हे माझी परवानगी न घेता ठरवण्यात आलं होतं. आणि तेच त्या कागदांवर माझ्याकडून लिहिलं (गेलं) होत. अशा छोट्या छोट्या पण मोठ्या वाटणाऱ्या बऱ्याच गोष्टी होत्या.

 नंतर नंतर तर कागदावर लिहिलेल्या गोष्टी वाचण्याचा वेग इतका वाढला, की काही गुंतवणुकीच्या जाहिरातीत शेवटी फक्त नियम आणि अटी लागू हेच समजतं, बाकी सगळं कानावरून जात, तसंच सगळं कानावरून गेलं. फक्त शेवटचा सोडलेला उसासा तेवढा समजला.

 असो…… आता तसाही त्या कागदांचा उपयोग नसला तरी यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी तशाच, पण चांगल्या अक्षरात परत लिहून काढेन. पण पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला………

 तो पर्यंत संदर्भ म्हणून गरज वाटली तर हे कागद आहेतच……….

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गीता जशी समजली तशी… – गीता आणि समत्व – भाग – ५ ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

☆ गीता जशी समजली तशी… – गीता आणि समत्व – भाग – ५ ☆ सौ शालिनी जोशी

आपले जीवन विरोधी गोष्टींनी युक्त आहे. इथे सुख आहे आणि दुःखही आहे. तसेच राग- द्वेष, लाभ-अलाभ, जय- पराजय, शीत- उष्ण असे द्वैत आहे. यापैकी एक गोष्टच एका वेळी साध्य असते. आपली स्वाभाविक ओढ सुखाकडे. ते हातात आल्यावर निसटून जाईल की काय भीती आणि सुख मिळवण्यासाठी केलेले श्रम दुःखच निर्माण करतात. सुखाचे दुःख कसे होते कळतच नाही. जयाच्या उन्मादात पराजय पुढे ठाकतो. साध्याच्या वाटेवर अडचणी येतात, सध्याचे असाध्य होते. असा हा लपाछपीचा खेळ म्हणजे जीवन. माणूस यातच गुंततो आणि खऱ्या शाश्वत सुखाला मुकतो. अशा वेळी या दोन्ही गोष्टी कशा सांभाळाव्या आणि आनंदी जीवन कसे जगावे याचा उपाय गीता सांगते. तो म्हणजे समत्व,समानता.

सुख म्हणजे इंद्रियांना अनुकूल आणि इंद्रियांना प्रतिकुल ते दुःख. (ख- इंद्रिय). या दोन्हीचा परिणाम मनावर होऊ द्यायचा नाही. मन स्थिर असेल तर बुद्धी ही स्थिर राहते. कार्याविषयी दृढभाव निर्माण होतो. इंद्रियांच्या प्रतिक्रिया नाहीत. हळहळ नाही, हुरळून जाणे नाही. सुखदुःख येवो, यश मिळो अथवा न मिळो अशा विरुद्ध परिस्थितीतही मनाची चलबिचल न होता स्थिर राहणे हेच गीतेत सांगितलेले समत्व. गीता म्हणते,’ सिद्ध्यसिद्ध्यो: समो भूत्वा समत्वं योग उच्यतेl’ म्हणजेच ‘सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जयाजयौl’ अशी ही स्थिती. शीत- उष्ण, शुभ -अशुभ, राग- द्वेष, प्रिय-अप्रिय, निंदा-स्तुती, मान- अपमान असे प्रसंग येतच असतात. कोणतीही वेळ आली तरी जो सुखाने हर्षित होत नाही. दुःखाने खचून जात नाही त्यालाच समत्व साधले. अशा बुद्धीने केलेले कर्म हे निष्काम होते. कर्मातील मनाचा असा समतोलपणा हाच निष्काम कर्मयोग आणि हे ज्याला साधलं तोच श्रेष्ठ भक्त, गुणातीत, जीवनमुक्त.

हेच समत्व वस्तू व प्राणीमात्रांविषयी, सर्व भूतान् विषयी असावे असे गीता सांगते. वस्तू विषयी म्हणजे ‘समलोष्ठाश्मकांचन:’ (६/८)अशी स्थिती. दगड,माती आणि सोन या तीनही विषयी समत्व. माणसाला सोन्याची आसक्ती असते. ती नसणे म्हणजे ‘धनवित्त आम्हा मृत्तिके समान’. असा माणूस अनासक्त असतो. तसेच व्यक्तीविषयी समत्व ही गीता सांगते ‘सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबंधुषु l साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यतेl(६/९). निरपेक्ष मित्र,उदासीन, मध्यस्थ, द्वेष करणारा, हितकारक बंधू, पापी आणि साधू पुरुष यांचे विषयी समभाव असणारा ब्राह्मण, गाय, कुत्रा, चांडाळ यातही समत्व पाहतो. कुणाच्या द्वेष करत नाही. वरवर ते भिन्न दिसले तरी सर्वांमध्ये एकच परमेश्वर आहे या भावनेने सर्वांचा योग्य आदर करणे हीच समत्वबुद्धी. भगवंत स्वतःही समत्त्वाचे आचरण करतात. ‘समोsहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योsस्ति न प्रिय:l’ ‘सर्व भूतात मी समभावाने व्यापून आहे. मला कोणी अप्रिय नाही आणि प्रिय नाही. हा भेद माझ्या ठिकाणी नाही. आत्मरूपाने मी सर्वांना व्यापून आहे.

सर्व भूतात भगवंत तोच माझ्यात आहे आणि मी त्यांच्यात हा सर्व भुतात्मभाव. ‘ जे जे देखे भूत ते ते भगवंत’ मान्य झाली की राग द्वेष कुणाच्या करणार ? सर्वत्र एकच परमात्मा पाहणे हेच समत्व. असे समत्व प्राप्त झाले की दृष्टिच बदलते. गत काळाचा शोक नाही, भविष्याची चिंता नाही. वर्तमानात सर्वांशी समत्वाने व्यवहार. प्राप्त कर्म उत्कृष्टपणे करणे हाच स्वधर्म होतो. शत्रु- मित्र आणि लाभ-अलाभ इत्यादी सर्व भेद स्वार्थापोटी. पण जेथे स्वार्थच नाही तिथे सर्वच समत्व. दोषांची निंदा नाही, गुणांचे स्तुती नाही दोन्ही सारखेच. आपपर भाव नाही. अशीही भेद रहित अवस्था म्हणजे सर्व सुख, मोक्ष.

असा हा जीवनाला आवश्यक विचार गीता सांगते. त्रासदायक गोष्टी टाळून शांत व सुखी जीवनाचा मार्ग दाखवते. अध्यात्माची दृष्टी देते. अर्जुनालाही युद्धातील जय पराजया विषयी समत्व सांगितले. युद्धात समोर येणारा कोणीही असला तरी शत्रूच असतो. ही समत्वबुद्धी सांगून अशा समत्व योगाने कर्म हेच कौशल्य असेही सांगितले. असे निष्काम बुद्धीने केलेल्या कर्माचे अकर्म होते. ते पाप पुण्य द्यायला शिल्लक राहत नाही. अशा प्रकारे अर्जुनाबरोबर सर्वांनाच गीता नवीन विचार देते. सत्कर्म, स्वधर्म, समत्व हा गीतेचा पायाच आहे.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्रतोपासना – ८. – राहतो त्या परिसराची निंदा करू नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

व्रतोपासना – ९. राहतो त्या परिसराची निंदा करू नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

काही व्यक्ती अशा दिसतात की, आपण राहतो ते घर व सोसायटी, परिसर याची निंदा करताना दिसतात. पण ज्या परिसराने आपल्याला समाज,शेजार दिला त्या जीवनाधार असलेल्या परिसराची व घराची कधीही निंदा करू नये.

आपली नोकरी,व्यवसाय जिथे असेल त्या ठिकाणी आपल्याला रहावेच लागते. त्या स्थाना बद्दल मनात नेहेमी कृतज्ञता असावी. त्याला नावे ठेवू नयेत. आपण कितीही संकटात असलो तरी आपल्या घरा जवळच्या परिसरात आपल्याला सुरक्षित वाटते. मानसिक आधार मिळतो. बऱ्याच जणांचे बालपण त्या परिसरात गेलेले असते. त्या वेळी याच ठिकाणी आपण किती आनंदी होतो, किती काळ येथे व्यतीत केला आहे अशा चांगल्या आठवणी आठवाव्यात.

जरी काही गोष्टींची कमतरता असेल तरीही त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा. गैरसोयी कायम स्वरुपी नसतात. जेथे राहतो त्या परिसरा विषयी आनंदी असावे. परिपूर्ण तर कोणीच नसते. आपल्यातही दोष असतातच. त्या परिसरात काय आहे या कडे लक्ष द्यावे. सदैव दोष, न्यूनत्व बघू नये. हे चराचर जग हे ब्रह्म आहे. त्या विषयी ममत्व,आपुलकी बाळगावी. म्हणजे दोष दिसत नाहीत आणि परकेपणा वाटत नाही.

प्रत्येकाने स्वतःशी विचार करून बघावा मी परिसराला नावे तर ठेवत नाही? आणि याचे उत्तर हो आले तर स्वतःची मनस्थिती बदलावी.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ४० ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ४० ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- लिलाताईचा हा श्रीदत्तदर्शनाचा नित्यनेम पुढे प्रदीर्घ काळ उलटून गेल्यानंतर माझ्या संसारात अचानक निर्माण होणाऱ्या दुःखाच्या झंझावातात त्या दुःखावर हळुवार फुंकर घालणार आहे याची पुसटशी कल्पनाही मला तेव्हा नव्हती.)

आम्ही कोल्हापूरला रहात होतो तेव्हाची गोष्ट. १९७९ साल. आमच्या संसारात झालेलं समीरबाळाचं आगमन सुखाचं शिंपण करणारंच तर होतं. बाळाला घेऊन आरती माहेरहून घरी आली तेव्हाचं नजरेत साठवलेलं त्याचं रुप आजही माझ्या आठवणीत जिवंत आहे. समीरबाळाचं छान गोंडस बाळसं,.. लख्ख गोरा गुलाबी रंग.. काळेभोर टपोरे डोळे.. दाट जावळ.. एवढीशी लांबसडक बोटं.. सगळंच कसं सुंदर आणि लोभसवाणं!

समीर माझ्या सहवासात येऊन मोजके दिवसच झाले होते. माझ्या नजरेत नजर घालून ओळख पटल्याचं छानसं कोवळं हसू समीर अजून हसलाही नव्हता त्यापूर्वीच कधी कल्पनाही केली नव्हती अशा त्या अरिष्टाची सुरुवात झाली. समीरला ट्रिपलपोलिओचा डोस द्यायचा होता. डॉ. देवधर यांच्या हॉस्पिटलमधे मी न् आरती त्याला घेऊन गेलो तर तिथे ट्रिपलपोलिओसाठी आधीपासूनचीच लांबलचक रांग. दुसऱ्या मजल्यावरील हाॅस्पिटलपासून सुरू झालेली ती रांग दोन जिने उतरून महाद्वार रोडच्या एका बाजूने वाढत चाललेली. पावसाळ्याचे दिवस. आभाळ गच्च भरलेलं. कुठल्याही क्षणी पाऊस सुरु होईल असं वातावरण. आम्ही रांगेत ताटकळत उभे. त्यात समीर किरकिरु लागलेला. काल रात्रीपासून हवापाण्याच्या बदलामुळं असेल त्याचं पोट थोडं बिघडलेलं होतं. रांग हलायची शक्यता दिसेना तसे पाऊस सुरु होण्यापूर्वी घरी जाऊ आणि नंतर कधीतरी आधी अपॉइंटमेंट घेऊन येऊ असं ठरवून आम्ही तिथून निघालो. आमचं घर जवळच्या ताराबाई रोडवरुन पुढं आलं की चालत दहा मिनिटांच्या अंतरावर. ताराबाई रोडवर येताच माझं लक्ष सहजच उजव्या बाजूच्या एका दवाखान्याच्या बोर्डकडे गेलं.

डाॅ. जी. एन्. जोशी. बालरोगतज्ञ बोर्ड वाचून मी थबकलो.

” इथं ट्रिपल पोलिओ डोस देतात कां विचारूया?” मी म्हंटलं. तिने नको म्हणायचा प्रश्नच नव्हता. आजच्या आज डोस देऊन होतोय हेच महत्त्वाचं होतं. आम्ही जिना चढून डॉ. जोशींच्या क्लिनिकमधे गेलो. मी स्वतःची ओळख करून दिली. आमच्या येण्याचं प्रयोजन सांगितलं. समीरचं किरकिरणं सुरूच होतं. त्यात त्याने दुपटं घाण केलं. डाॅ. नी नर्सला बोलावलं. आरती समीरला घेऊन तिच्याबरोबर आत गेली. त्याला स्वच्छ करून बाहेर घेऊन आली. ट्रिपल पोलिओचा डोस देऊन झाला. तेवढ्यांत त्याला पुन्हा लूज मोशन झाली. चिंताग्रस्त चेहऱ्याने डॉक्टर माझ्याकडेच पहात होते.

“बाळाचं पोट बिघडलंय कां? कधीपासून?” त्यांनी विचारलं.

“काल रात्री त्याला एक दोनदा त्रास झाला होता. आणि आज सकाळी इकडे येण्यापूर्वीसुध्दा एकदा. पाणी बदललंय म्हणून असेल कदाचित. पण तोवर छान मजेत असायचा. कधीच कांही तक्रार नव्हती त्याची. “

“ठीक आहे. एकदा तपासून बघतो. वाटलंच तसं तर औषध देतो. ” डॉक्टर म्हणाले.

त्यांनी समीरला तपासलं. त्याची नाडीही पाहिली. ते कांहीसे गंभीर झाले.

” बाळाला एक-दोन दिवसासाठी अॅडमिट करावं लागेल “

” अॅडमिट?कां? कशासाठी ?”

” तसं घाबरण्यासारखं काही नाहीय. पण इन्फेक्शन आटोक्यांत आणण्यासाठी तातडीने उपचार करणे आवश्यक आहे. एक-दोन दिवस सलाईन लावावं लागेल. पुढे एखादा दिवस ऑब्झर्वेशनखाली राहील. “

घरी आम्ही दोघेच होतो. आई मोठ्या भावाकडे सातारला गेली होती. पुढच्या आठवड्यात आरतीची मॅटर्निटी लिव्ह संपणार होती. त्यापूर्वी आई येणार होतीच. आत्ता लगेच अॅडमिट करायचं तर तिला लगोलग इकडे बोलावून घेणे आवश्यक होऊन बसेल. मला ते योग्य वाटेना.

“डॉक्टर, घरी आम्ही दोघेच आहोत. आम्हा दोघांच्या पेरेंट्सना आम्ही आधी बोलावून घेतो. तोवर त्याला तात्पुरतं औषध द्याल का कांही? तरीही बरं वाटलं नाही तर मात्र वाट न बघता आम्ही त्याला अॅडमिट करू. “

“अॅज यू विश. मी औषध लिहून देतो. दिवसातून तीन वेळा एक एक चमचा त्याला द्या. तरीही मोशन्स थांबल्या नाहीत तर मात्र रिस्क न घेता ताबडतोब अॅडमिट करा.”

त्यांनी औषध लिहून दिलं. जवळच्याच मेडिकल स्टोअरमधून आम्ही ते घेतलं. यात बराच वेळ गेला होता. मला बँकेत पोहोचायला उशीरच होणार होता. मी समोरून येणारी रिक्षा थांबवली. दोघांना घरी पोचवलं. दोन घास कसेबसे खाऊन माझा डबा भरून घेतला आणि बँकेत जाण्यासाठी बाहेर आलो. आरती बाळाला मांडीवर घेऊन बसलेली होती.

“त्याला औषध दिलंयस कां?”

“पेंगुळला होता हो तो. आत्ताच डोळा लागलाय त्याचा. थोडा वेळ झोपू दे. तोवर मी पाणी गरम करून ठेवते. जागा झाला की लगेच देते. ” ती म्हणाली.

तो शनिवार होता.

“आज हाफ डे आहे. मी शक्यतो लवकर येतो. कांही लागलं तर मला बॅंकेत फोन कर लगेच. काळजी घे ” मी तिला धीर दिला न् घाईघाईने बाहेर पडलो.

त्याकाळी क्वचित एखाद्या घरीच फोन असायचा. त्यामुळे फोन करायचा म्हणजे तिला कोपऱ्यावरच्या पोस्टात जाऊनच करायला लागणार. बाळाला घेऊन कशी जाईल ती?

हाफ डे असला तरी बॅंकेतून बाहेर पडायला संध्याकाळ उलटून गेलीच. त्यात बाहेर धुवांधार पाऊस. घरी पोचेपर्यंत अंधारुन तर आलं होतंच शिवाय मी निम्माशिम्मा भिजलेलो. आत जाऊन कपडे बदलून आधी गरम चहा घ्यावा असं वाटलं पण तेवढीही उसंत मला मिळणार नव्हती. कारण बेल वाजवण्यापूर्वीच दार किलकिलं असल्याचं लक्षात आलं. दार ढकलताच अजून लाईट लावलेले नसल्यामुळे आत अंधारच होता. पण त्या अंधूक प्रकाशातही समोर भिंतीला टेकून आरती समीरला मांडीवर घेऊन थोपटत बसली असल्याचं दिसलं.

“अगं लाईट नाही कां लावायचे? अंधारात काय बसलीयस?” मी विचारलं आणि लाईटचं बटन ऑन केलं. समोरचं दृश्य बघून चरकलोच. समीर मलूल होऊन तिच्या मांडीवर केविलवाणा होऊन पडलेला. निस्तेज डोळे तसेच उघडे. ऐकू येईल न येईल अशी म्लान कुरकूर फक्त.

“काय झालं?अशी का बसलीयस?”

“सांगते. आधी तुम्ही पाय धुवून या न् याला घ्या बरं थोडावेळ. पाय खूप अवघडलेत हो माझे. “

मनातली चहाची तल्लफ विरुन गेली. मी पाय धुऊन घाईघाईने कपडे बदलले आणि समीरला उचलून मांडीवर घेऊन बसलो. त्याचा केविलवाणा चेहरा मला पहावेना.

“जा. तू फ्रेश होऊन ये, मग बोलू आपण. ” मी आरतीला म्हंटलं. पण ती आत न जाता तिथंच खुर्चीवर टेकली. तिचे डोळे भरुन आले एकदम.

“तुम्ही ऑफिसला गेल्यापासून फक्त एक दोन वेळाच दूध दिलंय त्याला पण तेही पोटात ठरत नाहीय हो. आत्तापर्यंत चार दुपटी बदललीयत. काय करावं तेच कळत नाहीय. किती उशीर केलात हो तुम्ही यायला.. “

“तू फोन करायचा नाहीस का? मी रोजची सगळी कामं आवरत बसलो. त्यात हा पाऊस. म्हणून उशीर झाला. तू औषध कां नाही दिलंस?”

“दिलंय तर. दोन डोस देऊन झालेत. तिसरा रात्री झोपताना द्यायचाय. पण औषध देऊनही त्रास थांबलाय कुठं? उलट जास्तच वाढलाय. मला काळजी वाटतेय खूsप. काय करायचं?”

डाॅ. जोशी म्हणालेच होते. त्रास वाढला तर रिस्क घेऊ नका म्हणून. आम्हा दोघानाही या कशाचाच अनुभव नव्हता. अॅडमिट करण्यावाचून पर्यायही नव्हता. कुणा डाॅक्टरांच्या ओळखी नव्हत्या. समीरला डाॅक्टरांकडे न नेता रात्रभर घरीच ठेवायचीही भीती वाटत होती. माझी मोठी बहिण आणि मेहुणे सुदैवाने कोल्हापुरातच रहात होते. त्यांना समक्ष भेटून त्यांच्याशी बोलणं आवश्यक होतं. मी कपडे बदलून जवळचे सगळे पैसे घेतले न् बाहेर आलो.

” कुठे निघालात?”

“ताईकडे. त्या दोघांना सांगतो सगळं. त्यांनाही सोबत घेऊ. तू आवरुन ठेव. मी रिक्षा घेऊनच येतो. जोशी डाॅक्टरांकडे अॅडमिट करायच्या तयारीनेच जाऊ. बघू काय म्हणतायत ते. “

मी ताईकडे गेलो. सगळं सांगितलं.

“जोशी डाॅक्टर? पार्वती टाॅकीजजवळ हाॅस्पिटल आहे तेच का?” मेव्हण्यांनी विचारलं.

मी सकाळी डाॅक्टरांनी आम्हाला दिलेलं त्यांचं व्हिजिटिंग कार्ड खिशातून काढलं. पाहिलं तर हाॅस्पिटलचा पत्ता तोच होता.

” हो. तेच. त्यांचं ताराबाई रोडवर क्लिनिक आहे आणि हॉस्पिटल पार्वती टॉकीजजवळ. तुमच्या माहितीतले आहेत कां?”

” नाही. पण नाव ऐकून होतो. तरीही कोल्हापुरात डॉ. देवधर हेच प्रसिद्ध पेडिट्रेशियन आहेत. आधी त्यांना दाखवू या का? “

 ” चालेल. पण असं ऐनवेळी जाऊन भेटतील कां ते?नाही भेट झाली तर? सकाळी खूप गर्दी होती आम्ही ट्रिपलपोलिओ डोससाठी गेलो तेव्हा, म्हणून म्हटलं”

” ठिकाय. तू म्हणतोस तेही बरोबरच आहे. चल. “

आम्ही रिक्षातूनच घरी गेलो. आरती दोघांचं आवरून आमचीच वाट पहात होती. पावसाचा जोर संध्याकाळपासून ओसरला नव्हताच. समीरबाळाचं डोकं काळजीपूर्वक झाकून घेत ती कशीबशी रिक्षात बसली. मी रिक्षावाल्याला पार्वती टाॅकीजजवळच्या डाॅ. जोशी हाॅस्पिटलला न्यायला सांगितलं. रिक्षा सुरु झाली न् माझा जीव भांड्यात पडला. आत्तापर्यंत ठरवल्याप्रमाणे सगळं सुरळीत सुरू होतं असं वाटलं खरं पण ते तसं नव्हतं यांचा प्रत्यय लगेचच आला. एकतर पावसामुळे रिक्षा सावकाश जात होती. रस्त्यात खड्डेही होतेच. आपण कुठून कसे जातोय हेही चटकन् समजत नव्हतं. तेवढ्यांत रिक्षा थांबली.

” चला. आलं हॉस्पिटल. ” रिक्षावाला म्हणाला. उतरतानाच माझ्या लक्षांत आलं की आपण महाद्वार रोडवरच आहोत. त्या अस्वस्थ मन:स्थितीत मला त्या रिक्षावाल्याची तिडीकच आली एकदम.

“मी पार्वती टॉकीजजवळ डॉ. जोशी असं सांगितलं होतं ना तुम्हाला? इथं उतरुन काय करू?”

 त्यांने चमकून माझ्याकडं पाहिलं. थोडासा वरमला. मी पुन्हा रिक्षात बसलो.

“इथं कोल्हापुरात लहान वयाच्या पेशंटना देवधर डाकतरकडंच आणत्यात समदी. रोज चारपाच फेऱ्या हुत्यात बघा माज्या रिक्षाच्या. सवयीने त्येंच्या दवाखान्याम्होरं थांबलो बगा.. ” तो चूक कबूल करत म्हणाला. पण….. ?

पण ती त्याची अनवधानाने झालेली चूक म्हणजे पुढील अरिष्टापासून समीरबाळाला वाचवण्याचा नियतीचाच एक केविलवाणा प्रयत्न होता हे सगळं हातातून निसटून गेल्यानंतर आमच्या लक्षात येणार होतं… !!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares