मराठी साहित्य – विविधा ☆ शब्द, शब्द आणि शब्द… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

🌺 विविधा 🌺

☆ शब्द शब्द आणि शब्द… 🤔 ☆ श्री सुहास सोहोनी ☆

थारेपालट की थालेपारट ??

परोक्ष की अपरोक्ष ??

व्यस्त की व्यग्र ??

चपल की अचपल ??

व्यासपीठ की मंच ??

असे अनेक शब्द आहेत ना, जे चुकीच्या जागी – चुकीच्या अर्थाने सर्रासपणे वापरले जातात ! एक म्हणजे अर्थ नीट माहीत नसतो किंवा चुकीचा शब्द वापरायची रूढी किंवा परंपरा असते.

वरीलपैकी पहिलाच शब्द बघा ना. थारेचा मूळ शब्द थारा म्हणजे जागा किंवा आश्रय. पालट म्हणजे बदलणे. जसे कायापालट, खांदेपालट. म्हणून थारेपालट हा योग्य शब्द. म्हणजे जागा बदलणे. पण थालेपारट हा शब्द सुद्धा अनेक ठिकाणी चुकीने वापरला जातो.

 

परोक्ष आणि अपरोक्ष मध्ये तर घोळ ठरलेलाच. परोक्ष म्हणजे नजरेआड आणि अपरोक्ष म्हणजे नजरेसमोर. पण सर्रासपणे हे शब्द उलट अर्थी वापरले जातात.

 

“मी कामात व्यस्त होतो. ” असं म्हणणं खरं तर चुकीचं आहे. “मी कामांत व्यग्र होतो. ” हे बरोबर. अस्त-व्यस्त म्हणजे सुलट व उलट. त्याचे रूप बदलून नित्य वापराचा शब्द झाला अस्ताव्यस्त. म्हणजे पसरलेलं, बेशिस्त, पसारा. सम आणि व्यस्त हे विरोधाभासी शब्द तर आपण नेहमीच वापरतो. त्यामुळे “मी कामात व्यग्र आहे” हे बरोबर. तथापि व्यस्त या शब्दाला सुद्धा अलीकडे कामात गुंतलेला असणे, कामात बुडालेला असणे, हे अर्थ प्राप्त झाले आहेत आणि त्याला लोकमान्यता मिळाली आहे.

 

आपण चपल-अचपल हे शब्द चुकीच्या रुढीमुळे चुकीच्या पद्धतीने वापरले जातात. “अचपल मन माझे नावरे आवरिता” चपल या अर्थाने अचपल हा शब्द श्री रामदास स्वामींनी देखील वापरला आहे.

 

महाविद्वान, बुद्धिवंत अशा व्यासमुनींनी ज्या आसनावर किंवा पीठावर बसून महाभारत सांगितले, त्या आसनाला व्यासपीठ असं म्हणतात. हे आसन किंवा पीठ पवित्र समजले जाते. आध्यात्मिक, धार्मिक ज्ञानप्रबोधनाची प्रवचने ज्या आसनावरून दिली जातात ते व्यासपीठ.

एक किंवा अनेक वक्ते ज्या स्थानावरून राजकीय, सामाजिक, आर्थिक विषयांवर आधारलेली भाषणे देतात, त्या स्थानाला मंच असे म्हणतात.

ज्या स्थानावरून मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे – नाटके, गायन, नृत्य, तमाशा वगैरे सादरीकरण केले जाते, त्या स्थानाला रंगमंच असे म्हणतात. म्हणजेच व्यासपीठ, मंच व रंगमंच असे तीन प्रकार या स्थानांचे आहेत.

🌺

अशा स्वरूपाचे, चुकीच्या अर्थाने वापरले जाणारे, इतर अनेक शब्द सुद्धा प्रचलित आहेत.

☘️

©  श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बीज… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

बीज ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

बीज हा शब्द माहित नसेल असा मनुष्य शोधून सुद्धा सापडणार नाही. सर्वसाधारणपणे कोणत्याही वनस्पतीच्या बी ला बीज असे म्हटले जाते. इंग्रजी माध्यमात शिकलेली मुलं फार तर Seed अस म्हणतील, पण त्यामागील मर्म मात्र सर्वांना ठाऊक आहे.

आपला देश कृषिप्रधान आहे. पूर्वी “उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी” असे सूत्र समाजात प्रचलित होते. स्वाभाविकच शेती करणाऱ्याला समाजात खूप मोठा आणि खराखुरा मान होता. दुष्काळ काय सध्याच पडायला लागले असे नाही, ते याआधीही कमी अधिक प्रमाणात होतेच. त्याकाळात शेतकरी जरी पारंपारिक पद्धतीने शेती केली जात होती. शेतकरी आपल्या बियाण्याची पुरेशी काळजी घेत असत. शेती नैसर्गिक पद्धतीने केली जायची, श्रद्धेनी केली जायची. रासायनिक शेती नव्हतीच. आपली शेती तेव्हा पूर्णपणे गोवंशावर आधारित होती. त्यामुळे तेव्हा जे काही कमी अधिक अन्नधान्य शेतकऱ्याला मिळायचं ते *’सकस’*असायचे, ते पचविण्यासाठी आणिक हाजमोला खाण्याची गरज पडत नव्हती. एका अर्थाने मागील पिढ्या धष्ठपुष्ट होत्या. शिवकाळातील कोणत्याही सरदाराचा पुतळा किंवा छायाचित्र बघितले तर ते आपल्या सहज लक्षात येईल.

कोणत्याही कर्माचे फळ हे त्या कर्माच्या हेतूवर अवलंबून असते. शरीरावर शस्त्रक्रिया करणारा तज्ञ मनुष्याचे पोट फाडतो, आणि एखादा खुनी मनुष्यही पोट फाडतो. दुर्दैवाने शस्त्रक्रिया करताना रुग्णास मृत्यू आला तर त्या तज्ञास शिक्षा होत नाही, पण खून करणाऱ्यास शिक्षा होण्याची शक्यता जास्त असते. पूर्वीच्या काळी बलुतेदार पद्धती असल्यामुळे शेतकरी धान्य फक्त स्वतःसाठी, अधिकाधिक फायद्यासाठी न पिकवता संपूर्ण गावासाठी पिकवायचा आणि तेही देवाचे स्मरण राखून. आपली समाज रचना धर्माधिष्ठित होती. इथे ‘धर्म’ हा धर्म आहे, आजचा ‘धर्म’ (religion) नाही. धर्म म्हणजे विहीत कर्तव्य. समाजातील प्रत्येक घटक आपापले काम ‘विहीत कर्तव्य’ म्हणून

करायचा. त्यामुळे त्याकाळी प्रत्येक काम चांगले व्हायचे कारण एका अर्थाने तिथे भगवंताचे अधिष्ठान असायचे.

मधल्या काळात पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेले. देश स्वतंत्र झाला. विकासाची नविन परिमाणे अस्तित्वात आली आणि ती कायमची समाजमनात ठसली किंवा जाणीवपूर्वक ठसवली गेली. जूनं ते जुनं (टाकाऊ) आणि नवीन तितके चांगले असा समज समाजात जाणीवपूर्वक दृढ करण्यात आला. भारतीय विचार तेवढा मागासलेला आणि पाश्चिमात्य विचार मात्र पुरोगामी (प्रागतिक) असा विश्वास समाजात जागविला गेला. विकासाचा पाश्चात्य विचार स्वीकारल्याचे दुष्परिणाम आज आपण सर्वजण कमीअधिक प्रमाणात अनुभवत आहोत. अधिकाधिक धान्य उत्पादन करण्याच्या नादात रासायनिक खतांचा बेसुमार वापर करून आणि गोकेंद्रित शेती न करता आपण इंधन तेलावर आधारित परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्च करणारी ‘श्रीमंत’ शेती करू लागलो आणि वसुंधरेचे नुसते आपण नुसते दोहन केले नाही तर तिला ओरबाडून खायला सुरुवात केली. त्यामुळे पुढील पिढीला जागतिक तापमान वाढ, वातावरणातील बदल, आर्थिक विषमता आणि भूगर्भातील पाण्याचा तुटवडा अशा कितीतरी भयानक गोष्टी भेट म्हणून जन्मताच वारसाहक्काने दिल्या असे म्हटले तर वावगे होऊ नये. ह्यातून आज तरी कोणाची सुटका नाही.

ह्या सर्व गोंधळात आपण बीज टिकविण्याचे सोयीस्कररित्या विसरलो. जिथे बीजच खराब तिथे पीक चांगले येईल अशी अपेक्षा करणे हा मूर्खपणाच ठरणार, नाही का? “शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी ।।” असे संतांनी सांगितले असताना आपण ते ‘संतांनी’ सांगितले आहे म्हणून दुर्लक्ष केले आणि हीच आपली घोडचूक झाली असे म्हणता येईल. आपल्या सर्वांच्या एक गोष्ट लक्षात आली असेलच. खराब झालेले बीज फक्त शेतातील बियाण्याचे नाही तर आज प्रत्येक क्षेत्रात आपल्याला त्याची प्रचिती येते.

समाजातील सज्जनशक्तीबद्दल पूर्ण आदर व्यक्त करून असे म्हणावेसे वाटते की खूप शिक्षक पुष्कळ आहेत पण चांगला शिक्षक शोधावा लागतो, शाळा भरपूर आहेत पण चांगली शाळा शोधावी लागते, डॉक्टर भरपूर आहेत पण चांगला डॉक्टर शोधावा लागतोय, वकील पुष्कळ आहेत पण चांगला वकील शोधावा लागतोय, अभियंते भरपूर आहेत पण चांगला अभियंता शोधावा लागतोय. आज ही परिस्थिती समाजपुरुषाच्या प्रत्येक घटकास कमीअधिक प्रमाणात लागू आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते. हे चित्र बदलण्याचे कार्य आज आपणा सर्वांना करायचे आहे. कारण संकट अगदी आपल्या घरापर्यंत येऊन पोहचले आहे. हे सर्व ऐकायला, पहायला, स्वीकारायला कटू आहे पण सत्य आहे. आपण आपल्या घरात कोणते बीज जपून ठेवत आहोत किंवा घरात असलेले ‘बीज’ खरेचं सात्विक आहे की त्यावरील फक्त वेष्टन (टरफल) सात्विक आहे याचीही काळजी घेण्याची सध्या गरज आहे. वरवर दिसणारे साधे पाश्चात्य शिष्ठाचार आपल्या संस्कृतीचा बेमालूमपणे ऱ्हास करीत आहेत. शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा आणि आपल्या घरात शिवाजीचा मावळा सुद्धा जन्मास येऊ नये असे जोपर्यंत आईला वाटेल तो पर्यंत यात काहीही फरक पडणार नाही.

संत ज्ञानेश्वरांच्या काळात देखील असेच अस्मानी आणि सुलतानी संकट होते. राष्ट्राचा विचार करताना दोनचारशे वर्षांचा काळ हा फार छोटा कालखंड ठरतो. माऊलींपासून सुरु झालेली भागवत धर्माची पर्यायाने समाज प्रबोधनाची चळवळ थेट संत तुकारामांपर्यंत चालू राहिली. ह्या सर्व पिढ्यानी सात्विकता आणि शक्तीचे बीज टिकवून ठेवले त्यामुळे त्यातूनच शिवाजी राजांसारखा हिंदू सिंहासन निर्माण करणारा स्वयंभू छत्रपती निर्माण झाला. “बहुता सुकृताची जोडी । म्हणोनि विठ्ठलीं आवडी।।” म्हणणारे तुकोबाराय सुद्धा हेच सूत्र (शुद्ध बीज टिकविले पाहिजे) वेगळ्या भाषेत समजावून सांगत आहेत. समर्थांच्या कुळातील मागील कित्येक पिढ्या रामाची उपासना करीत होत्या, म्हणून त्या पावनकुळात समर्थ जन्मास आले. कष्टाशिवाय फळ नाही, नुसते कष्ट नाही तर अखंड साधना, अविचल निष्ठा, तितिक्षा, संयम, धैर्य अशा विविध गुणांचा संचय करावा लागतो तेव्हा कुठे ‘ज्ञानेश्वर’, ‘तुकाराम’, ‘छत्रपती शिवाजी’, ‘सावरकर’, ‘भगतसिंग’, डॉ. हेडगेवार जन्मास येत असतात.

मृग नक्षत्र लागले की आपल्याकडे पाऊस सुद्धा कमी अधिक प्रमाणात सुरु होतो. शेतकऱ्यांची बियाणे पेरायची झुंबड उडते. शेतकरी आपले काम श्रद्धेनी आणि सेवावृत्तीने करीत असतात. आपणही त्यात आपला खारीचा वाटा घ्यायला हवा. आपल्याला देशभक्तीचे, माणुसकीचे, मांगल्याचे, पावित्र्याचे, राष्ट्रीय चारित्र्याचे, सांस्कृतिक स्वातंत्र्याचे, तसेच समाजसेवेचे बीज पेरायला हवे आहे आणि त्याची सुरुवात स्वतःपासून, आपल्या कुटुंबापासून करायची आहे.

विकासाच्या सर्व कल्पना मनुष्यकेंद्रीत आहेत आणि ती असावयासच हवी. पण सध्या फक्त बाह्यप्रगती किंवा भौतिक प्रगतीचा विचार केला जात आहे. पण जोपर्यंत मनुष्याचा आत्मिक विकास होणार नाही तोपर्यंत भौतिक विकासाचा अपेक्षित परिणाम आपल्याला दिसणार नाहीत. मागील शतकात लॉर्ड मेकॉले नावाचा एक ब्रिटिश अधिकारी भारतात येऊन गेला. संपूर्ण भारतात तो फिरला. नंतर त्याने ब्रिटिश संसदेत आपला अहवाल सादर केला. त्यात तो स्वच्छपणे सांगतो की संपूर्ण भारतात मला एकही वेडा आणि भिकारी मनुष्य दिसला नाही. सर्व जनता सुखी आहे. आणि ह्याला एकच कारण आहे ते म्हणजे इथली विशिष्ठ कुटुंब रचना आणि कुटुंबातील जेष्ठांचा आदर करण्याची पद्धत (‘एकचालकानुवर्तीत्व’).

आज आपल्याकडे काय परिस्थिती आहे हे वेगळे सांगण्याची गरजच नाही, वृद्धाश्रमांच्या संख्येवरूनच ते आपल्या लक्षात येईल. हे एक उदाहरण झाले. अश्या बऱ्याच गोष्टीत आपण पाश्चात्य लोकांस मागे टाकले आहे.

एक छान वाक्य आहे. “लहानपणी आपण मुलांना मंदिरात घेऊन गेलो तर तीच मुलं म्हातारपणी आपल्या तीर्थयात्रा घडवतात”.

‘मुलं एखादवेळेस ऐकणार नाहीत पण अनुकरण मात्र नक्की करतील हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. मुलांनी अनुकरण करावे असे वातावरण आपण आपल्या नविन पिढीला देऊ शकलो तर हे खूप मोठे राष्ट्रीय कार्य होईल. त्यासाठी समाजात नवीन आदर्श प्रयत्नपूर्वक निर्माण करावे लागतील आणि असलेल्या आदर्शाना समाजासमोर प्रस्तुत करावे लागेल. आपल्या मुलांकडून माणुसकीची अपेक्षा करण्याआधी आपण त्यांना आपल्या आचरणातून माणुसकी शिकवावी लागेल. आपल्याकडे विवाहसंस्कार सुप्रजा निर्माण करण्यासाठी आहे. तो फक्त ‘सुख’ घेण्यासाठी नक्कीच नाही, पण याचा विचार विवाहप्रसंगी किती कुटुंबात केला जातो ?, मुख्य ‘संस्कार’ सोडून बाकी सर्व गोष्टी दिमाखात पार पाडल्या जातात, पण विवाह संस्था आणि गृहस्थाश्रम म्हणजे काय हे कोणी सांगत नाही. ते शिकविणारी व्यवस्था आज नव्याने निर्माण करावी लागेल.

हिंदू संस्कृती पुरातन आहे. जशी आपली ‘गुणसूत्रे’ आपण आपल्या पुढील पिढीस सुपूर्द करीत असतो तसेच ‘नीतीसूत्रे’ही पुढील पिढीस देण्याची निकड आहे. अर्थात नितीसुत्रे देताना मात्र आचरणातून अर्थात ‘आधी केले मग सांगितले’ या बोधवचनाचे स्मरण ठेऊन द्यावी लागतील आणि हा महान वारसा जपण्याची प्रेरणा सुद्धा. आपल्या पुढील पिढीला आपल्या वडिलांची कीर्ती सांगावीशी वाटेल असे आपण जगायचा प्रयत्न करायला हवा. पाऊस पडल्यावर सर्व वसुंधरेस चैतन्य प्राप्त होते, बहुप्रसवा असलेली वसुंधरा हिरवा शालू पांघरते, या सृजनातून सर्व प्राणीमात्रांना वर्षभर पुरेल इतके अन्नधान्य प्राप्त होत असते. या आल्हाददायी वातावरणाचा मानवी मनावरदेखील सुखद परिणाम होत असतो.

या आल्हाददायी, मंगलमयी वातावरणामुळे आपल्या विचारांनासुद्धा नवसंजीवनी प्राप्त व्हावी आणि ‘सुसंस्कारांचे, सात्विकतेचे बीज संवर्धित आणि सुफलीत’ करण्याचे कार्य आपणा सर्वांकडून घडावे अशी श्रीरामचरणी प्रार्थना करतो.

भारत माता कि जय।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पत्यांचा डाव…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “पत्यांचा डाव…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

(दै‌. लोकमत मंथन पुरवणीत २२ सप्टें. २०१९ ला प्रकाशित)

सकाळपासून माझी थोडी चुळबुळ सुरु होती. पण कोणाशी बोलावं हे काही कळत नव्हतं. बाबा दोन दिवसांकरता बाहेरगावी गेले होते. नाहीतर त्यांच्याशी बोलून मन थोडं मोकळं करता आलं असतं.

मित्राच्या घरी त्यांचे थोडे घरगुती वाद झाल्याने त्याच्या घरच वातावरण थोड गढूळ झाल होत. त्यामुळे मी थोडा अस्वस्थ होतो.

माझी ही चुळबुळ कदाचित आजोबांच्या अनुभवी आणि चाणाक्ष नजरेने हेरली असेल असे वाटतं. कारण त्यांनी शांतपणे मला बोलावलं, समोर बसवलं आणि पत्याचा कॅट काढून पत्ते वाटून म्हणाले, बैस, जरा दोन डाव खेळ. फ्रेश वाटेल आणि विचारांना दिशा मिळेल.

पत्ते खेळतांना ते काही जास्त बोलले नाहीत. मग हळूच म्हणाले, आपल्याकडे असलेल्या पत्यांमधून आपण चांगला डाव लावण्याचा प्रयत्न करतो. सगळे डाव चांगलेच येतात असे नाही. काही चांगले असतात, लवकर लागतात. काही थोडे अवघड असतात, उशीरा लागतात, पण लागतात हे नक्की. त्यासाठी आवश्यक त्या पत्यांची जुळवाजुळव करावी लागते. काही पत्ते सोडावे लागतात, तर काही समोरच्याने टाकलेले किंवा आपण ओढून घेतलेले उपयोगात येतील का हे बघावे लागतं.

आपल्या आयुष्यात रोज उगवणारा दिवस असाच पत्यांच्या डावासारखा आहे. काय सोडावं आणि काय धरावं याचा शांतपणे आणि योग्य विचार केल्यास रोजचा डाव चांगल्या पध्दतीने सोडवण्यास मदत होते.

काही वेळा वेगळ्या डावांमध्ये आपण हुकूम सुध्दा बोलतो. आपल्याकडे भारी असलेले पत्ते हुकूमाच्या हलक्या पाना पुढे निष्प्रभ ठरतात. पण यातुनच सावरायचे असते. आणि पुढच्या चांगल्या डावाची प्रतीक्षा करायची असते.

हे सगळं बोलून होईपर्यंत आमचे दोन डाव झाले होते. मग ते शांतपणे म्हणाले, दोन डावात तुझ्या लक्षात आले का? आपल्याकडून काही पत्ते सोडले जातात, काही टाकले जातात, तर काही दिले जातात.

जे सोडतो ते दोघांच्याही उपयोगाचे नसतात. म्हणून समोरचाही उचलत नाही.

जे टाकतो ते कदाचित थोड्या कालावधीनंतर उपयोगात येणार असतात. असे पत्ते समोरचा उचलतो.

आणि जे देतो ते हमखास लगेचच उपयोगी आणि डाव लागायला कारणीभूत असतात, व बऱ्याचवेळा आपल्याला हे माहीत सुध्दा असते.

आपल्या रोजच्या जीवनातही येणाऱ्या प्रसंगात देण्याची वृत्ती असावी. त्याने समस्या सुटायला मदत होते. ज्या गोष्टी अपायकारक किंवा निरुपयोगी आहेत त्या सोडून द्याव्या. ज्या गोष्टींचा त्याग आत्ता केला तर चांगलेच होणार आहे त्या टाकून द्याव्या.

जेव्हा कोणाला संसारात, मैत्रीत साथ हवी असते त्या वेळी एकमेकांचा डाव लागतील असे पत्ते (विचार, मदत, संयम, धैर्य) द्यावे. त्यामुळे आपला किंवा त्याचा डाव लागण्यास मदत होते. येथे एकमेकांशी स्पर्धा, ईर्षा असता कामा नये. स्पर्धेत मी नाही तर तु सुध्दा नाही असा विचार असतो. पण रोजच्या डावात तो विचार ठेऊन चालत नाही.

प्रत्येक डाव लागण्यासाठी थोडा वेळ हा द्यावाच लागतो. तुमच्या पिढीचा हा त्रास आहे की तुम्हाला लगेच निकाल अपेक्षित असतात. थोडा संयम ठेवण्याची वृत्ती तुमच्याकडे नाही. जुळवाजुळव किंवा काही अंशी तडजोड तुम्ही सहज स्विकारत नाही. त्यामुळे मीच आणि माझेच बरोबर असा ग्रह कदाचित निर्माण होऊन डाव विस्कटण्याची शक्यता असते.

आता शांतपणे विचार कर आणि निर्णय घे. म्हणजे तुझी चुळबुळ शांत होईल.

आता मात्र मी मित्रांकडे जाऊन शांतपणे सगळे ऐकून व समजावून घेईन व काय सोडायचे, काय टाकायचे, व काय कोणी द्यायचे हे ठरवून त्यांचा डाव व्यवस्थित लाऊन देईन या बद्दल माझी खात्री झाली आहे.

धन्यवाद आजोबा, पत्याच्या डावातून देणं, घेणं, सोडण, जुळवण, व संयम दाखवणं हे शिकवल्याबद्दल. असे मी म्हणालो आणि मित्राकडे त्याचा डाव सावरायला बाहेर पडलो.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पोकळी आणि श्रद्धांजली ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

पोकळी आणि श्रद्धांजली ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“आज xxx xxx यांच्या जाण्यामुळे कधीही भरून न निघणारी अशी एक पोकळी निर्माण झाली आहे !”

हे एखाद्या नेत्याच्या किंवा एखाद्या मान्यवराच्या तोंडातलं वाक्य, कोणी दिग्गज कलाकार किंवा नेता आपल्या सर्वांना कायमचा सोडून गेल्यावर त्या मृत व्यक्तीला श्रद्धांजली वाहतांना हमखास ऐकायला मिळत. पण या वाक्याचं खरेपण किती पोकळ आहे हे आपल्या सर्वांच्या मनांत असलं, तरी उघडपणे ते कोणी बोलून दाखवत नाही. कारण शिष्टाचार !

अशा कोणा एकाच्या जाण्यामुळे आपल्या सर्वांच्याच जीवनात खरंच अशी, कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण होते का हो ? आपण मला विचाराल तर पोकळी वगैरे काही नाही, पण थोडे दिवस त्या व्यक्तीच्या आठवणीने दुःख होतं, व्याकुळ व्हायला होतं वगैरे, वगैरे ! गेलेली व्यक्ती आपल्या किती जवळची होती यावर त्या दुःखाची इंटेंसिटी अवलंबून असते, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे.

मंडळी, राम-कृष्णासारखे अवतार या भूतलावरून गेले तरी जग रहाटी थांबल्याचे किंवा एखादी कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाल्याचे माझ्या तरी ऐकीवात नाही. त्यामुळे आपल्या सारख्या मर्त्या मानवामुळे आपण गेल्यावर पोकळी वगैरे निर्माण व्हायचा प्रश्नच कसा निर्माण होईल ? एखादी व्यक्ती जग सोडून गेल्यावर तो किंवा ती, आपल्या कितीही जवळचा किंवा जवळची असली तरी हे त्रिवार सत्य आपण नाकारू शकतो का ? अगदी आपले आई वडील गेल्यानंतर सुद्धा, कोणी उरलेल्या सगळ्या आयुष्यात दुःख करत हातावर हात ठेवून बसलाय असं माझ्या तरी पाहण्यात नाही. शेवटी प्रत्येकाला स्वतः जिवंत राहण्यासाठी स्वतःच हातपाय हलवणे गरजेचे नाही का ? यावर हे “तुमचं पोकळ मत पटलं नाही बुवा !” असं कोणीही म्हणू शकेल, त्याला माझा ईलाज नाही. पण या बाबतीत भा. रा. तांबे यांच्या कवितेच्या “जन पळ भर म्हणतील….. ” या अजरामर ओळी आपण आठवून पहा, असं मी त्या लोकांना नक्कीच सांगेन ! असो !

मंडळी, अनेक शोक सभांच्या दुःखद प्रसंगी, त्याला किंवा तिला श्रद्धांजली वाहतांना ज्याच्या त्याच्या तोंडी तेच तेच वाक्य ऐकून मला तर कधी कधी हसू येत, अर्थात मनातल्या मनांत ! कारण असा एखादा दिग्गज कलाकार गेला, तरी भविष्यात कुठल्यातरी नवीन कलाकाराची अदाकारी किंवा त्याच गाणं किंवा वादन ऐकून आपल्याला गेलेल्या कलाकाराची आठवण येते असं आपण अनेकदा म्हणतो! गेलेल्या नेत्याच्या बाबतीत आजच्या “या” तरुण नेत्यामधे “त्या अमुक तमुक नेत्याचे” गुण दिसतात, असं म्हटलं जात.

आपली मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी ज्यांची काहीच भरीव कामगिरी नाही, पण ज्यांना सामान्यपणे आपली माय मराठी भाषा बोलता अथवा लिहिता येते, कळते, तो किंवा ती सुद्धा माझ्या आधीच्या वाक्याशी सहमत होतील, याची मला खात्री आहे !

“आज xxx xxx यांच्या जाण्यामुळे कधीही भरून न निघणारी अशी एक पोकळी निर्माण झाली आहे !” हे लेखाच्या सुरवातीच वाक्य आपल्याकडे सर्वात प्रथम कोणी आणि कोण गेल्यावर त्याला किंवा तिला श्रद्धांजली वाहतांना उच्चारलं असेल, या बद्दल मला खरंच माहिती नाही, पण मला ते जाणून घ्यायची पोकळ नाही पण भरीव इच्छा नक्कीच आहे ! या बाबत श्रद्धांजली वाहण्याच्या विषयात तज्ञ असलेली मंडळी, मला पोकळ आश्वासन न देता काहीतरी ठोस माहिती पुराव्यासकट देतील अशी मला आशा आहे.

बरं वर्षान वर्ष कोणत्याही श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात हेच वाक्य अजून आपली जागा राखून आहे, याच सुद्धा मला कधी कधी नवल वाटतं ! आपली मराठी भाषा इतकी समृद्ध असतांना या वाक्याला अजून तोडीस तोड वाक्य मिळू नये, हे मराठी भाषेच दुर्दैव म्हणायचं का ? का या गंभीर विषयात “आपण कशाला नाक खुपसा” असा सूज्ञ विचार मराठी भाषेच्या विचारवंतांनी किंवा श्रद्धांजली वाहण्यात एक्स्पर्ट असलेल्या लोकांनी केला आहे ? पूर्वापार चालत आलेल्या जशा अनेक परंपरा आपल्याकडे आपण डोळे मिटून पाळत आहोत, तशाच पद्धतीने हे घासून गुळगुळीत आणि पोकळ झालेलं वाक्य, अशा दुःखद प्रसंगी श्रद्धांजली वाहणाऱ्याच्या तोंडातून आपोआप बाहेर येत असावं, असं मला स्वतःला कधी कधी मग वाटून जात.

एखादा माणूस आपला मुद्दा दुसऱ्याला समजावतांना त्याच्या बोलण्यातून, देह बोलीतून तो खरंच मनापासून पोट तिडकीने बोलतोय का वरवरच बोलतोय, हे सामान्यपणे लोकांना कळतं. पण या लेखाच जे ब्रीद वाक्य आहे ते कोणी कधीही, कितीही वेळा बोलला तरी त्यातील पोकळपणा लगेच मला तरी दिसून येतो. अर्थात तो इतरांना सुद्धा दिसत, कळत असेल, पण वर म्हटल्याप्रमाणे तो उघडपणे म्हणून दाखवायचं किंवा बोलायचं हे शिष्टाचाराच्या आड येत असल्यामुळे तसं कोणी बोलून दाखवत नाही, हे ही तितकंच खरं !

शेवटी, इतक्या वर्षांनी आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्या नंतर, आता तरी मराठी भाषेच्या अभ्यासकांनी या “पोकळ” भासणाऱ्या वाक्याला बदलून, त्या ऐवजी अशा श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला काहीतरी नवीन असं भरीव वाक्य तयार करावं, शोधावं असं मला मनापासून वाटतं ! त्यामुळे होईल काय, गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला, या श्रद्धांजलीच्या नवीन वाक्याने थोडं तरी आत्मिक समाधान मिळेल, अशी आशा करायला काय हरकत आहे ?

ताजा कलम – आपण अटेंड केलेल्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात, एखाद्या वक्त्याने “पोकळी” या शब्दाशिवाय कोणाला श्रद्धांजली वाहिली असेल, तर कृपया मला ते वाक्य जरूर कळवा !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गीता जशी समजली तशी… – मला आवडलेले गीतेतील पाच श्लोक – भाग – ४ ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

☆ गीता जशी समजली तशी… – मला आवडलेले गीतेतील पाच श्लोक – भाग – ४ ☆ सौ शालिनी जोशी

मला आवडलेले गीतेतील पाच श्लोक

गीता हा अर्जुनाला पुढे करून सर्व मानव जातीला केलेला उपदेश आहे. ते आचरण शास्त्र आहे. त्यातील सर्वच श्लोक सारख्याच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यात सरस-निरस ठरवणे कठीण. तरीही ७०० श्लोकातून माझ्या दृष्टीने महत्त्वाचे वाटलेले पाच लोक निवडण्याचा प्रयत्न मी केला. त्यातील पहिला श्लोक म्हणजे उन्नतीचा मंत्रच व स्वावलंबनाचा धडा

 १) उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् l

 आत्मैव ह्यात्मनो बंन्धुरात्मैव रिपुरात्मन:ll(६/५)

माणसाने स्वतः स्वतःचा उद्धार करावा. स्वत:च स्वतःच्या नाशाला कारण होऊ नये. प्रत्येक जण आपणच आपला बंधू (हित करणारा) आणि आपणच आपला शत्रू (अधोगती करणारा )असतो.

यातून लक्षात येते की प्रत्येकाने आपल्यातील दोषांकडे दुर्लक्ष न करता ते घालवण्याचा व सद्गुण जोपासण्याचा प्रयत्न करावा म्हणजेच बंधू व्हावे. ‘ जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला’ हेच येथे लक्षात ठेवावे. उच्च स्थितीला पोहोचावे व यशस्वी व्हावे.

अशा प्रकारे स्वतःच्या उद्धारासाठी कर्म करत असताना कोणते पथ्य पाळावे हे सांगणारा दुसरा श्लोक

 २) कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l

 मा कर्मफलहेतुर्भूमा ते सङ्गोsस्त्वकर्मणी ll(२/४७)

कर्म करत असताना कर्त्याची भूमिका कशी असावी याची चार सूत्रे येथे सांगितली आहेत. कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, त्याच्या फळाविषयी कधीही नाही. कर्मफलाच्या इच्छेने कर्म करणारा होऊ नको. तसेच ते न करण्याच्या आग्रहही नको.

कर्म केल्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. म्हणून स्वधर्माने प्राप्त झालेले कर्म उत्तम प्रकारे आचरावे. पण त्याचे फळ मिळणे आपल्या हातात नसते. फळ मिळणे हा भविष्यकाळ आहे. त्यात रमून वर्तमानातील कर्मावर दुर्लक्ष करू नये. कामातील आनंद घ्यावा. कर्मफल काहीही मिळो, त्याला कारण मी असे समजून कर्तुत्व अभिमान घेऊ नये. येथे अकर्म म्हणजे कर्म न करणे. मी कर्मच करत नाही म्हणजे फळाचा प्रश्न नाही असा विचार करून कर्म त्यागणे अयोग्य आहे.

अशा प्रकारे केलेले कर्म ईश्वरार्पण कसे करावे हे पुढील श्लोकात.

 ३) यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्l

 यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्ll (९/२७)

भगवंत अर्जुनाला सांगतात तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस, जे तप करतोस ते मलाच अर्पण कर. माणसाची कर्मे ही साधारणपणे चार प्रकारची असतात आहार, यज्ञ, दान आणि तप. कर्म अर्पण करणे म्हणजे त्यातील कर्तृत्व भाव अर्पण करणे व फळ प्रसाद रूपाने ग्रहण करणे. यज्ञ म्हणजे फळांचा काही भाग समाजासाठी अर्पण करणे. दान म्हणजे सत्पात्री व्यक्तीला योग्य काळी शक्य ती मदत करणे आणि तप म्हणजे शरीर, मन आणि वाणी यांनी केलेली साधना. या सर्व ज्यावेळी भगवंतासाठी होतात, निस्वार्थ बुद्धीने अपेक्षा रहित होतात, तेव्हा प्रत्येक कर्म म्हणजे त्याची पूजा होते. त्याची प्राप्ती करून देणारे होते. बंध निर्माण होत नाही. अशीही कर्मा मागची खूबी व भक्तीचे व्यापकपण.

अशाप्रकारे कर्म करण्याचा अधिकार कोणाकोणाला आहे भगवंत सांगतात

 ४) मां हि पार्थ व्यपाश्रित्य येsपि स्यु: पापयोनय: l

 स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेsपि यान्ति परां गतिम् ll(९/३२)

हे अर्जुना, स्त्रिया, वैश्य, शूद्र तसेच पापयोनी कुणीही असो माझ्या आश्रयाला आले असता परमगतीला प्राप्त होतात. म्हणजे भगवंत प्राप्तीचा अधिकार सर्वांना आहे. तेथे कोणताही भेदभाव नाही. म्हणून सर्व जातीत आणि स्त्रिया सुद्धा संत पदाला पोचल्या. त्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतली. जो त्याच्या आश्रयाला जातो तो त्याचाच होतो. वेदाने जे अधिकार नाकारले ते गीतेने मिळवून दिले. म्हणून शबरी अनन्य भक्तीने मुक्त झाली व वाल्याचा वाल्मिकी झाला. आपणही जातीपातीवरून भेदभाव करू नये. सर्वाभूती परमेश्वर लक्षात घ्यावे.

गीता ग्राह्य व अग्राह्य दोन्ही गोष्टी सांगते. कोणत्या गुणाचा त्याग करावा म्हणजे सत मार्ग सापडतो त्याचे मार्गदर्शन गीता करते.

 ५) त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मन:l

काम: क्रोधस्तथा लोभस्तादेतत्त्रयं त्यजेत्ll(१६/२२)

काम क्रोध आणि लोभ ही तीन प्रकारची नरकाची द्वारे आहेत. आपला नाश करणारी आहेत. म्हणून या तिघांचा त्याग करावा.

हे तीनही तामसी गुण आहेत. माणसाच्या अधोगतीला कारण होणारे आहेत. मोठे मोठे विद्वानही यांच्या अधीन होऊन आपल्याच अपयशाला कारण झाले. उदाहरणार्थ विश्वामित्र (काम), दुर्वास (क्रोध). अतृप्त इच्छा क्रोधाला जन्म देतात. त्या कामना पूर्ण करण्यासाठी द्रव्यासक्ती निर्माण होते हाच लोभ. त्यासाठी अवैध मार्गाचाही अवलंब केला जातो. परिणामतः नरकासारख्या हीन अवस्थेत राहण्याची वेळ माणसावर येते. म्हणून योग्य वेळीच विवेक व वैराग यांच्या बळावर या तीनही टाळाव्या व मिळेल त्यात सुखी समाधानी राहावे.

अशा प्रकारे स्वतः स्वतःचे हित साधणे. फलेच्छारहित कर्म करणे. ते ईश्वरा अर्पण करणे. असे कर्म कोणीही करू शकतात. मात्र तेथे लोभ नको. हा मार्ग सुख समाधान देणारा. म्हणून मला हे पाच श्लोक आवडले. नित्य आचरणात आणण्यासारखे आहेत.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्रतोपासना – ७. कोणत्याही ऋतूची निंदा करु नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

व्रतोपासना – ७. कोणत्याही ऋतूची निंदा करु नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

जसे आपण काही व्रत कथा वाचल्या की, त्यात प्रथम लिहिलेले असते ‘उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको. ‘ त्याच प्रमाणे कोणती व्रते करावीत हे आपण बघत आहोत. ही व्रते जुनीच आहेत फक्त काळानुसार आपण त्यात थोडा बदल करुन अंमलात आणावे.

वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर अशा सहा ऋतूंनी आपले संवत्सर पूर्ण होते. आणि हे ऋतूचक्र अव्याहत चालू असते. त्या मुळेच संपूर्ण जीवसृष्टीला, माणसाला जगण्यासाठी आवश्यक गोष्टी मिळतात. कधी कधी काही ऋतूंचा त्रास होऊ शकतो. पण तो काही जणांनाच होतो. काहींना ऋतू बदलाचा पण त्रास होतो. या बदलाच्या काळात काहींना आरोग्याशी संबंधित समस्या येऊ शकतात. पण त्यात ऋतूंचा दोष नसतो. आपली प्रत्येकाची प्रकृती भिन्न असते. त्या नुसार आपल्याला त्रास होतात. पण आपण आहार, विहार, विश्रांती, यात ऋतू प्रमाणे बदल करुन कधी आवश्यक ती औषध योजना करुन हे त्रास, आजार नियंत्रित करु शकतो. परंतू या कोणत्याही ऋतूंची निंदा करणे योग्य नाही.

आपण निसर्गा कडे बघितले की निसर्ग प्रत्येक ऋतुशी कसे जमवून घेतो, पशुपक्षी कसे जमवून घेऊन राहतात हे समजते. आणि कोणत्याही परिस्थितीत आनंदी कसे रहायचे हे शिकवतात. एक माणूसच असा आहे की आनंद शोधण्या पेक्षा दु:ख शोधत रहातो. आपल्याला जर कोणी आठवणी विचारल्या किंवा लिहायला सांगितल्या तर आनंदी प्रसंग फार कमी समोर येतात. आणि अवघड, दुःखाचे प्रसंग जास्त आठवतात. ही सवय जर आपण बदलू शकलो तर आपण कायम आनंदात राहू शकतो. हेच ऋतूंच्या विषयी करायचे. प्रत्येक ऋतुतील आनंद शोधायचा. आयुर्वेदिक औषधे देणाऱ्यांना या ऋतूंचे खूप महत्व असते. आपली संस्कृती, आपले सण समारंभ बघितले तर त्यात निसर्गाचेच पूजन दिसते. आपल्या पूर्वजांनी सगळे सण व त्यातील आहार, पूजा, व्रते त्या त्या ऋतू नुसार ठरवलेली होती. ऋतू बदलतात म्हणून तर आपल्याला विविध फळे, फुले यांचा आस्वाद घेता येतो. आणि अनेक प्रकारची धान्ये, भाज्या मिळतात. हा सर्व विचार करून विविधता देणाऱ्या ऋतूंचा सन्मान करु या. आणि या ऋतूंची निंदा बंद करु या.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

९/११/२०२४

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ३९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- “शांत हो. काळजी नको करू. सगळं व्यवस्थित होईल. बेबीचं तर होईलच तसं तुझंही होईल. येत्या चार दिवसात तुला दत्तमहाराजांनी ठरवलेल्या स्थळाकडूनच मागणी येईल. बघशील तू”

 बाबा गंमतीने हसत म्हणाले. कांहीच न समजल्यासारखी ती त्यांच्याकडे पहातच राहिली. )

 आज जवळजवळ पन्नास वर्षांनंतर हे सगळे प्रसंग नव्याने आठवताना त्या आठवणींमधला एकही धागा विसविशीत झालेला किंवा तुटलेला नसतो ते त्या अनुभवांच्या त्या त्या वेळी माझ्या अंतर्मनाला जाणवलेल्या अलौकिक अनुभूतीमुळे! आणि या अनुभूतीमधला मुख्य दुवा ठरली होती ती हीच लिलाताई!

 लिलाताई माझ्यापेक्षा जवळजवळ बारा वर्षांनी मोठी. अर्थातच माझ्या सर्वात मोठ्या बहिणीपेक्षाही सहा वर्षांनी मोठी. केवळ वयातलं अंतर म्हणूनच ती माझी ताई नव्हती तर तिने आपल्या सख्ख्या दहा भावंडांइतकंच आमच्यावरही मोठ्या बहिणीसारखंच प्रेम केलं होतं! मी तर तिचा तिच्या लहान भावंडांपेक्षाही कणभर जास्तच लाडका होतो. आम्ही त्यांच्या शेजारी रहायला गेलो तेव्हा मी चौथीतून पाचवीत गेलो होतो. त्याआधी मला अभ्यासात कांही शंका आली तर आईला किंवा मोठ्या बहिणीला विचारायचो. आता त्याकरता लिलाताई माझा पहिला चाॅईस असायची. तिचं शांतपणे मला समजेल असं समजावून सांगणं मला आवडायचं. माझी पुढची चारपाच वर्षे शाळेतल्या सगळ्या बौध्दिक स्पर्धांची तयारीसुध्दा तीच करुन घ्यायची चित्रकला, वक्तृत्व, कथाकथन, गद्यपाठांतर, गीतापठण, निबंधलेखन, हस्ताक्षर अशा सगळ्या स्पर्धांची तिने करुन घेतलेली तयारी म्हणजे खणखणीत नाणंच. अशा सगळ्या स्पर्धांत मला बक्षिसं मिळायची, कौतुक व्हायचं तेव्हा मिळालेलं बक्षिस, प्रमाणपत्र हातात घट्ट धरुन मी पळत घरी यायचो ते थेट शेजारी लिलाताईकडेच धाव घ्यायचो. तिला मनापासून झालेला आनंद, तिच्या नजरेतलं कौतुक आणि मला जवळ घेऊन तिने दिलेली शाबासकी हेच माझ्यासाठी शाळेत मिळालेल्या बक्षिसापेक्षाही खूप मोठं बक्षिस असायचं! तिच्यासोबतचे माझे हे भावबंध गतजन्मीचे ऋणानुबंधच म्हणायला हवेत. विशेषकरुन मला तसे वाटतात ते नंतर आलेल्या ‘अलौकिक’ अनुभवामुळेच!!

 बाबांनी सांगितल्याप्रमाणे ती बाहेर जाऊन दत्ताला नमस्कार करुन आली, बाबांनी दिलेला तीर्थप्रसाद घेतला. बाबांना नमस्कार करून झरकन् वळली आणि डोळे पुसत खालमानेनं घरी निघून गेली.

 “किती गुणी मुलगी आहे ना हो ही? दुखावली गेलीय बिचारी. तिच्या डोळ्यांत पाणी बघून बरं नाही वाटत. “

 ” ते दु:खाचे नाहीत, पश्चातापाचे अश्रू आहेत. देव पहातोय सगळं. तो तिची काळजी नक्की घेईल. बघच तू. “

 बाबांच्या तोंडून सहजपणे बाहेर पडलेल्या या सरळसाध्या शब्दांमधे लपलेलं गूढ त्यांनाही त्याक्षणी जाणवलेलं होतं की नाही कुणास ठाऊक पण त्याची आश्चर्यकारकपणे उकल झाली ती पुढे चारच दिवसांनी कुरुंदवाडच्या बिडकर जमीनदारांच्या घराण्यातून लिलाताईसाठी मागणी आली तेव्हा!!

 हे सर्वांसाठीच अनपेक्षितच नाही तर सुखद आश्चर्यकारकही होतं!

 लिलाताईच्या आनंदाला तर पारावार नव्हता. “शांत हो. काळजी नको करू. सगळं व्यवस्थित होईल. बेबीचं तर होईलच, तसंच तुझंही होईल. येत्या चार दिवसात तुला दत्त महाराजांनी ठरवलेल्या स्थळाकडूनच मागणी येईल. बघशील तू. ” बाबांच्या अगदी अंतःकरणापासून व्यक्त झालेल्या या बोलण्यातला शब्द न् शब्द असा खरा झाला होता! कारण तिला मागणी आली होती ती कुरुंदवाडच्या जमीनदार घराण्याकडून!!

 “काका, मी लग्न होऊन सासरी गेले तरी आता नित्य दत्तदर्शन चुकवायची नाही. कारण कुरुंदवाडहून नृसिंहवाडी म्हणजे फक्त एक मैल दूर. हो की नै?” तिने बाबांना त्याच आनंदाच्या भरात विचारले होते.

 “तुझी मनापासून इच्छा आहे ना? झालं तर मग. तुझ्या मनासारखं होईल. पण त्यासाठी अट्टाहास नको करू. तू सासरी जातेयस. आधी त्या घरची एक हो. तुझं कर्तव्य चुकवू नको. बाकी सगळं दत्त महाराजांवर सोपवून निश्चिंत रहा. “

 बाबांनी तिला समजावलं होतं.

 पाटील आणि बिडकर या दोन्ही कुटुंबांची कोणत्याच बाबतीत बरोबरी होऊ शकत नव्हती. पाटील कुटुंब कसंबसं गुजराण करणारं. बिडकर जमीनदार घराणं. सख्खं-चुलत असं वीस बावीस जणांचं

एकत्र कुटुंब. उदंड धनधान्य. दुभती जनावरं त्यामुळं दूधदुभतं भरपूर. ददात कशाचीच नव्हती. रोज दिवसभर डोक्यावर पदर घेऊन वावरणं मात्र लिलाताईला एक दिव्य वाटायचं. इकडच्या मोकळ्या वातावरणामुळे या कशाची तिला सवयच नव्हती. पण सासरची माणसं सगळी चांगली होती. हिच्या डोक्यावरचा पदर पहिल्या दिवशी सारखा सारखा घसरत राहिला तेव्हा सगळ्या सासवा एकमेकींकडे पाहून गंमतीने हसायच्या. तिला सांभाळून घ्यायच्या. ‘सवयीने जमेल हळूहळू’ म्हणायच्या. दारापुढं हिने काढलेल्या रांगोळ्या बघून बायकाच नव्हे तर घरातले कर्ते पुरुषही तिचं मनापासून कौतुक करायचे. मूळच्याच शांत, हसतमुख, कलासक्त, कामसू, सुस्वभावी लिलाताई त्या आपुलकीच्या वातावरणामुळे अल्पकाळातच त्या घरचीच एक कधी होऊन गेली तिचं तिलाच समजलं नाही.

 “घरचं सगळं आवरून मी नृसिंहवाडीला रोज दर्शनाला जाऊन आले तर चालेल?”

 एक दिवस तिने नवऱ्याला विचारलं. त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं.

 “एकटीच?”

 “हो. त्यात काय?”

 “घरी नाही आवडायचं. “

 “कुणाला?”

 “कुणालाच. मोठे काका नकोच म्हणणार. ते म्हणतील तीच पूर्व दिशा असते. “

 “मी विचारु त्यांना?”

 “तू? भलतंच काय?”

 “मग मोठ्या काकींना विचारते हवंतर. त्या परवानगी काढतील. चालेल?”

 तिच्या निरागस प्रश्नाचं त्याला हसूच आलं होतं.

 “नको. मी बोलतो. विचारतो काकांना. ते हो म्हणाले तरच जायचं”

 “बरं” तिने नाईलाजाने होकारार्थी मान हलवली. काका काय म्हणतील या विचाराने रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता.

 “देवदर्शनालाच जातेय तर जाऊ दे तिला. पण एकटीने नाही जायचं. तू तिच्या सोबतीला जात जा. त्यानिमित्ताने तुझंही देवदर्शन होऊ दे. ” काका म्हणाले. घरच्या इतर बायका़ंसाठी हे आक्रीतच घडलं होतं. ज्या घरच्या बायका आजपर्यंत नवऱ्याबरोबर कधी फिरायला म्हणून घराबाहेर पडल्या नव्हत्या त्याच घरची ही मोठी सून रीतसर परवानगी घेऊन रोज देवदर्शनासाठी कां असेना नवऱ्याबरोबर फिरून येणार होती याचं त्या सगळ्यांजणींना अप्रूपच वाटत राहिलं होतं!

 दुसऱ्याच दिवसापासून लिलाताईचं नित्य दत्तदर्शन सुरु झालं. पहाटे उठून आंघोळी आवरून झपाझप चालत दोघेही नृसिंहवाडीची वाट धरायचे. दर्शन घेऊन अर्ध्यापाऊण तासात परतही यायचे.

 लिलाताईच्या या नित्यनेमानेच तिला आमच्याशीही जोडून ठेवलं होते. कारण मोबाईल नसलेल्या पूर्वीच्या त्या काळात पाटील कुटुंबीयांपैकी बाकी कोणाशीच भेटीगाठी, संपर्क राहिला नव्हता. पण लिलाताई मात्र आम्हाला अधून मधून भेटायची ती तिच्या या नित्यनेमामुळेच. आईचाही पौर्णिमेला वाडीला जायचा नेम असल्याने दर पौर्णिमेला न ठरवताही लिलाताईची न् तिची भेट व्हायचीच. लिलाताई रोज तिथे आली की ‘अवधूत मिठाई भांडार’ मधेच चप्पल काढून ठेवून दर्शनाला जायची. पौर्णिमेदिवशी “लिमयेवहिनी आल्यात का हो?” अशी त्यांच्याकडे चौकशी ठरलेलीच. त्यांच्यामार्फत निरोपानिरोपी तर नेहमीचीच. कधी आईला सवड असेल तेव्हा आग्रहाने कुरुंदवाडला आपल्या सासरघरी घेऊन जायची. पुढे माझा नित्यनेम सुरु झाल्यावर आम्हीही संपर्कात राहू लागलो.

 हे सगळे घटनाप्रसंग १९५९ पासून नंतर लिलाताई १९६४ साली लग्न होऊन कुरुंदवाडला गेली त्या दरम्यानच्या काळातले. पण तिचा तोच नित्यनेम पुढे प्रदीर्घकाळ उलटून गेल्यानंतर माझ्या संसारात अचानक निर्माण झालेल्या दु:खाच्या झंझावातात मला सावरुन माझ्या दु:खावर हळूवार फुंकर घालणाराय याची पुसटशी कल्पनाही मला तेव्हा नव्हती.

 प्रत्येकाच्याच आयुष्यात घडणाऱ्या वरवर सहजसाध्या वाटणाऱ्या घटनांचे धागेदोरे ‘त्या’नेच परस्परांशी कसे जाणीवपूर्वक जोडून ठेवलेले असतात याचा प्रत्यय मात्र त्यानिमित्ताने मला येणार होता!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मकरसंक्रमण ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

?  विविधा ?

☆ मकरसंक्रमण ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

 – मकरसंक्रांत आली कि आपण पंचांग, कॅलेंडर पाहतो त्यावर बरच काही लिहिलेलं असतं मकर संक्रांति वर! म्हणजे त्या दिवशी संक्रांतीचा शुभकाळ, पर्वकाळ, पुण्यकाळ दान करायच्या गोष्टी कोणतं वस्त्र नेसायचं. याची शास्त्रशुद्ध माहिती असते. मकर संक्रांतीच्या आधी आपण धुंधुरमास साजरा करतो त्याचं महत्त्व मुलांना समजावून द्यावं लागत. नव्या मुगाची डाळ घालून केलेली खिचडी वांग्याची भाजी मटकीची उसळ असं चटकदार थंडीला पोषक जेवणं असत. आणि सूर्योदयाच्या आत हे भोजन करायचं. जणूं येणाऱ्या मकर संक्रमणात सूर्याचं स्वागतच. ते खरंच सुग्रास आणि चवदार काहीतरी वेगळं केल्याचं मनाला समाधान देणार असायचं. आता फारसं कोणी पहाटे उठून वगैरे करत नाही. त्या भोजनाचा आनंद सगळेच घेतात. त्यानंतर भोगी !. शक्ती म्हणजे देवी आणि कृषी म्हणजे शेती या दोन्हीचा समन्वय म्हणजे भोगीचा दिवस. भोग म्हणजे नैवेद्य त्याचा प्रसाद म्हणजे प्रसन्नता. ही प्रसन्नता घेऊनच भोगी येते या दिवसांत सगळीकडे नवधान्यं, भाज्या सगळं नवीन आलेलं असतं त्याचा आनंद प्रसन्नता ही संक्रांतीपूर्वीच आलेली असते म्हणून भोगी प्रथम येते नंतर मकरसंक्रांत!. भोगीला, तीळ लावलेली बाजरीची भाकरी त्याच्यावर लोण्याचा गोळा, खिचडी, तीळाची चटणी, आणि नवीन आलेल्या फळभाज्या, पालेभाज्या, यांची मिळून केलेली भोगीची खास अशी चवदार भाजी. ! याचा नैवेद्य आणि भोजनही! संध्याकाळी दिवे लागणीनंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम असायचा. तेव्हा नवीन वस्त्र परिधान करून हळदी कुंकू लावून विड्यांच्चा पानांवर, सुपारी, बदाम, खारका, सुकं खोबरं, लेकुरवाळ हळकुंड हातात देऊन नंतर सुवासिनी एकमेकींची हळद कुंकू लावून ओटी भरायच्या. याला विडा देणं- घेणं असं म्हणतात. आरसा कंगवा घेऊन त्यांच्या केसावरून फिरवायची एक रीत आहे. तिळाचा लाडू द्यायचा. वर पानांचा गोविंद विडा करून द्यायचा. संध्याकाळच्या वेळी हा कार्यक्रम असायचा. कांरण. पूर्वीच्या काळी संध्याकाळच्या वेळी घरातील स्त्रिया आरशांत पहात वेणी- फणी असं काही करतच नसत. त्यामुळे स्त्रियांना हा दिवस फार महत्त्वाचा वाटायचा. आता हे फारसं कुणी करतांना दिसत नाहीत. आता परिस्थितिही बदलली. आहे. यानंतर येणारा दिवस म्हणजे मकर संक्रांत!

या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो शुभकाळ म्हणजे पुण्यकाळ पर्वकाळ सूर्याचं हे संक्रमण म्हणजे मकर संक्रांत!. तीळ वाटून हळदीसह अंगाला लावून अभ्यंग स्नान करून या दिवसाची छान सुरुवात होते. दारात, देवापुढे सूर्य मंडल रेखून त्याची पूजा करायची पद्धत आहे. ‘सूर्यपूजन’ यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. तसेच मातीच्या सुगडांची पूजाही! मातीच सुगड हे आपल्या देहाचं प्रतीक आहे या सगळ्यात म्हणजे देहात पंचमहाभूतांच प्रतिक म्हणून नव्या धान्यांची ऊंस, गाजर, नव्या शेंगभाज्या, तीळ गुळ, आणि हळदीकुंकू घालून कापसाचे गेजा वस्त्र वाहून व दोऱ्यांनी म्हणजे सुताने बांधून सुवासिनी पूजा करतात पूजा करताना या सुगडाला हळदी कुंकवाने रंगवलेली बोटं उठवलेली असतात. अशी सुगडाची पूजा म्हणजे आपल्यातील देवत्वाची पूजाच. !पुरण, तिळगुळ पोळी-लाडूचा नैवेद्य दाखवून’ ज्ञान, आरोग्य, वस्त्र, धनसंपदा, निवारा ‘, मिळावा यासाठी प्रार्थना करून देवीला सौभाग्याचं दान मागतात. शस्त्र शास्त्र यांच्या उपासनेमुळे शक्ती, कृषी, ज्ञान यांच्या साधनेत येणाऱ्या, विघ्नांचा नाश होतो अशी श्रद्धा आहे. हळदी कुंकू म्हणजे पवित्र भावना किंवा विधी. या दिवशी हळदीकुंकू हलवा तिळगुळ आणि वस्तू लुटायच्या. आयुष्यात चांगल्या गोष्टी तिळा-तिळा न येतात वाईट गोष्टी मात्र पटकन येतात आपल्या शरीराची मनाची तिळा-तिळान वाढ होते कोणतीही गोष्ट थोडी थोडी म्हणजे तिळा-तिळाने वाटून घेतली की त्यातलं दुःख कमी होतं पण सुख तिळातिळानं वाढतं यासाठी आपलं सुख आनंद आपल्या जाणिवा आपल्या दुःखासह तिळासारख्या सर्वांना वाटाव्यात दुसऱ्याच्याही घ्याव्यात या भावना यामागे आहेत. हाच खरा मकर संक्रमणाचा म्हणजे आपल्याही मनाच्या स्थित्यंतराचा खरा सणं म्हणूयात! तिळगुळ हे स्नेहाची नात्याची, मैत्रीची गोडी, कायम राहावी यासाठी देतात घेतात. तिळासारखं स्वच्छ स्नेहलमनं आणि त्याबरोबरच गुळाची गोडीही वाढते. काटेरी हलवा काट्यांबरोबर संसारात गोडीही असते हे सांगतो काळ वस्त्र म्हणजे अंधाराचं प्रतीक असलं तरी त्यावरील बुंदके ठिपके असणं म्हणजे नक्षत्रांना आवाहन करण्यासारखंच असतं. असं वस्त्र नेसून हळदीकुंकू एका व्रताप्रमाणे करून वस्तू हा एक सामाजिक वसाही म्हणता येईल. एखादी वस्तू मुक्तपणे दुसऱ्यांना दान करणे लुटणं यात सात्विक आनंद असतोच याबरोबरच या दिवशी आपल्याला जीवन देणाऱ्या सूर्यनारायणाची प्रार्थना करावी ” हे सूर्य नारायणा तुझ्या प्रकाशाबरोबर तू पृथ्वीवर ये अन आमच्या तनां मनातल्या अंधारावर छान सुंदर स्वप्नांचं पांघरून घाल. तुझी आग नको प्रकाश दे. निरामय व आरोग्यमय जीवन दे. आमच्या ज्ञानाची, नात्यांची, स्नेहांची, कक्षा वाढव. “

मग काय.. “आता तिळगुळ घ्या गोड गोड बोला………..

मकरसंक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा..!💐

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मकर संक्रांत… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ मकर संक्रांत… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

हिंदू संस्कृतीतील इंग्रजी तारखे प्रमाणे येणारा एकमेव सण म्हणजे ‘ मकर संक्रांत ‘. पौष महिन्यातला हा महत्त्वाचा सण. संक्रमण याचा अर्थ ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे. संक्रांतीच्या सण म्हणजे निसर्गाचा उत्सव आहे असे म्हणायला हरकत नाही. भारत हा कृषिप्रधान देश असल्याने, निसर्गाशी, शेतीशी, पर्यावरणाशी, आयुर्वेदाशी निगडित असणारा असा हा उत्सव आहे. 22 डिसेंबर पासून सूर्याच्या उत्तरायणाला सुरुवात झाली तरी, सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, संक्रमण करतो तो दिवस 14 जानेवारी. मकर संक्रांत ही सूर्यभ्रमणामुळे पडणारा फरक भरून काढण्यासाठी दर आठ वर्षांनी संक्रांतीचा दिवस एक दिवस पुढे ढकलला जातो. आणि 15 जानेवारीला तो सण उत्सव साजरा केला जातो. मकर राशीतील प्रवेशानंतर सूर्याचे तेज वाढत जाते. दिवसाचा काळ मोठा आणि रात्रीचा काळ लहान व्हायला सुरुवात होते. संपूर्ण देशभर हा उत्सव किंवा सण साजरा केला जातो. पौराणिक, भौगोलिक, अध्यात्मिक, संस्कृतिक, ऐतिहासिक अशा सर्व दृष्टीने या सणाचे महत्त्व आहे. पुढे येणाऱ्या रथसप्तमी पर्यंत तो साजरा केला जातो. वेगवेगळ्या प्रदेशानुसार या सणाची नावे आणि साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्रात ‘संक्रांत, ‘ तामिळनाडूमध्ये ‘पोंगल’, कर्नाटक आणि केरळ मध्ये ‘संक्रांति’, उडपी भागात ‘संक्रमण, ‘ तर काही ठिकाणी या दिवशी सूर्याने उत्तरायणी चळवळ सुरू केली म्हणून त्यास ‘उत्तरायण’ असेही म्हणतात. तसेच शेतात धान्याची कापणी चालू असते म्हणून ‘कापणीचा सण’ असेही म्हणतात. तेलुगु लोक त्याला ‘बेंडा पाडुंगा ‘, तसेच बुंदेलखंडात ‘सकृत ‘, उत्तर प्रदेश बिहारमध्ये खिचडी करून ती सूर्यदेवाला अर्पण करून दानही दिले जाते, त्यामुळे या दिवसाला ते ‘खिचडी ‘असेच म्हणतात. हिमाचल आणि हरियाणा मध्ये ‘मगही ‘ आणि पंजाब मध्ये ‘लोव्ही, ‘ मध्यप्रदेशात ‘सक्रास, ‘ जम्मूमध्ये ‘उत्तरैन ‘, काश्मीरमध्ये ‘ शिशुर सेन्क्रांत ‘, आसाम मध्ये ‘ ‘भोगाली बिहू ‘असे म्हणतात. ओरिसामध्ये आदिवासी लोक या दिवसापासून नवीन वर्ष सुरू करतात. केरळमध्ये तर हा उत्सव ७, १४ २१ किंवा ४० दिवसांचाही करून, संक्रांती दिवशी त्याची सांगता करतात. गुजरात मध्ये आजही तिळाच्या लाडू मध्ये दान घालून, गुप्त दान देण्याची प्रथा आहे. तसेच तेथे पतंग उडविण्याच्या स्पर्धाही घेतल्या जातात. त्यामागील शास्त्र म्हणजे पतंग उडविण्यासाठी मैदानात जावे लागते. आणि आपोआप सौरस्नान घडते. सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे. त्या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिक दृष्ट्या ही खूप महत्त्व आहे. संपूर्ण देशभर हा सण साजरा होत असल्याने विविधतेत एकता (युनिटी इन डायव्हर्सिटी )आणणारा असा हा सण आहे असे म्हणायला हरकत नाही. केवळ भारतातच नाही

तर थायलंड, लाओस, म्यानमार येथेही हा सण साजरा करतात. या दिवसानंतर हळूहळू ऋतूतही बदल होतो.

सूर्याचा (पृथ्वीचा) धनु रास ते मकर रास या प्रवासाच्या काळाला ‘धनुर्मास ‘ किंवा ‘धुंधुरमास ‘ म्हणतात. (१३ डिसेंबर ते १३ जानेवारी). मकर संक्रांतीचा आदला दिवस ‘भोगी’ हा धनुर्मासाचा शेवटचा दिवस. या काळात एक दिवस पहाटे स्वयंपाक करून उगवत्या सूर्याला नैवेद्य दाखविला जातो. संक्रांतीचा तीन दिवसांचा उत्सव असतो. भोगी, संक्रांत, आणि किंक्रांत.

भोगी दिवशी सुगडाच्या (मातीचा घट) पूजेला महत्त्व असते. मातीचे नवीन घट (दोन किंवा पाच) आणून त्यामध्ये छोटी बोळकी (ज्याला चिल्लीपिल्ली म्हणतात.) ठेवून, या ऋतूत आलेले घेवडा, सोलाणा, गाजर, ऊस, बोरं, गहू, तिळगुळ असे जिन्नस त्यात भरून ते देवापुढे ठेवून त्याची पूजा करतात. एका सुपामध्ये बाजरीचे पीठ, कांदा, शेंगा, मुंगडाळ, वांग, वस्त्र, विड्याची पानं, दक्षिणा, सुपारी, इतकच नाही तर स्नानासाठी, खोबरेल तेल, शीकेकाई, असे सर्व ठेवून ते स्नानापूर्वी सुवासिनीला वाण (भोगी) देण्याची पद्धत आहे. त्या दिवशीच्या स्वयंपाकात तीळ लावून बाजरीची भाकरी, राळ्याचा भात, खिचडी, सर्व भाज्या एकत्र करून मिक्स भाजी, (त्या भाजीला लेकुरवाळ म्हणतात) भरपूर लोणी, दही असा आरोग्यदायी थाट असतो.

यानंतरचा मुख्य दिवस ‘संक्रांत’. या दिवसाची एक पौराणिक कथाही सांगतात. संक्रांत देवीने शंकरासुर दैत्याचा वध केला. तो हा आनंदाचा दिवस मानला जातो. संक्रांति म्हणजे ‘ सम्यक क्रांती’. क्रांती मध्ये हिंसेला महत्त्व असेल, पण सं – क्रांतीमध्ये, मानवी मनाचे संकल्प बदलण्याचा विचार असतो. संक्रांती म्हणजे ‘संघक्रांती ‘. प्रत्येकाने मुक्त, आनंदी जीवन जगणाऱ्या लोकांशी संघयुक्त होऊन षड्रिपूं पासून दूर राहण्याचा संकल्प करायला हवा, असा एक विचार आहे. संक्रांती म्हणजे ‘संघक्रांती, ‘संघे शक्ति कलौयुगे’. संघामध्ये शक्ती विपुल प्रमाणात एकत्र आल्याने कठीण कार्यही सहजगत्या पार पडते. हा सण- उत्सव लोकांना जोडण्याचे काम करतो. म्हणून आनंद, सुसंवाद आणि ऐक्य तसेच अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग (तमसोमा ज्योतिर्गमय ) असा मानला जातो. या दिवशी रात्र आणि दिवस समसमान असतात. हळूहळू नंतर दिवस मोठा व्हायला लागतो आणि रात्र लहान व्हायला लागते.

संक्रांतीला तीळ (स्नेह ) गुळ (गोडी) याला महत्त्व आहे. आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसात रुक्ष झालेल्या शरीराला स्निग्धतेची आणि उष्णतेची गरज असते. ती गरज भागवणारे तीळ आणि गूळ हे सर्वोत्तम खाद्य आहे. या दिवशी तीळयुक्त पाण्याने स्नान करतात. अध्यात्मानुसार तिळामध्ये इतर तेलांपेक्षा सत्व लहरी ग्रहण करण्याची क्षमता जास्त असल्याने, सूर्याच्या संक्रमण काळात साधना चांगले होते. तिळाचे तेल पुष्टीप्रदही असते. या दिवशी ब्राह्मणांना तीळ दान, आणि शिवमंदिरात तिळाच्या तेलाचे दिवे लावतात. पितृश्राद्ध करून, तिलांजली देऊन, तर्पण करतात. तिळामुळे असुर श्राद्धात विघ्न आणत नाहीत अशी समजूत आहे. जेवणात गुळाच्या किंवा पुरणाच्या पोळ्या हे मुख्य पक्वान्न असते. आप्तेष्टांना तीळ- गुळाची वडी- लाडू देऊन, ” “तिळगुळ घ्या गोड बोला” असे शब्द उच्चारले जातात. तिलवत वद स, स्नेह गुडवत मधुरं वद/ उभयस्य प्रदानेन स्नेहवृद्धी: चिरंभवेत “अशी सदिच्छा व्यक्त केली जाते. काही जण पुण्यकाळाच्या मुहूर्तावर सूर्य देवाला आर्घ्य देऊन, आरती करून, सूर्य मंत्र (चांगल्या भविष्यासाठी २१ किंवा १०८ वेळा पठण करतात. पूजेच्या वेळी काही भाविक १२ मुखी रुद्राक्ष धारण करतात. त्यामुळे चेतना व वैश्विक बुद्धिमत्ता बऱ्याच पातळ्यांपर्यंत वाढून कामे यशस्वी होतात, असा समज आहे. शनिदेव मकर राशीचे स्वामी असल्याने जप, तप, ध्यान अशा धार्मिक क्रियां नाही महत्त्व आहे.

नवीन लग्न झालेल्या मुलीला सासरचे लोक काळी साडी, हलव्याचे दागिने आणि तिळगुळ आणतात. तसेच जावयाला हार. गुच्छ वाटीत ( चांदी किंवा स्टील ऐपतीप्रमाणे) तिळगुळ घालून देतात. त्याचप्रमाणे लहान बाळालाही, काळे कपडे व हलव्याचे दागिने घालून बोरन्हाण घालण्याची प्रथा आहे. कोणी कोणी बाळ पाच वर्षाचा होईपर्यंत दरवर्षी बोरन्हाण घालतात. दिवस थंडीचे असल्याने, काळ्या रंगाने उब येत असल्याने काळे कपडे घालण्याची प्रथा असावी. तसेच काळ्या रंगाची वस्त्रे नेसून काळोख्या मोठ्या रात्रीला निरोप दिला जातो.

भगवान विष्णूनी राक्षसांचा वध करून, त्यांची मस्तकं मंदार पर्वतात पुरून टाकली. त्यामुळे नकारात्मकता दूर झाली. त्याचे प्रतीक म्हणून, “तिळगुळ घ्या गोड बोला” असं म्हणून अबोला, नकारात्मकता, राग, द्वेश दूर व्हावेत असे विचार केले जातात. या दिवशी गंगा, गोदावरी, प्रयाग, अशा नदीस्नानाचे महत्त्व जास्त आहे. तरी त्यातही, अश्वमेध आणि वाजपेय यज्ञ यासारखे पुण्य संक्रांतीला गंगासागराच्या स्नानाने प्राप्त होते असे समजतात. या दिवशी गंगा स्नान करून दानधर्म केल्यास चांगले फळ मिळते.

वैदिक पंचांगानुसार यावर्षी १४ जानेवारी मंगळवार रोजी ९ वा ३ मी. यावेळी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होत आहे. गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त ९ वा. ३ मि. ते ५ वा ४६ मी. पर्यंतचा आहे. यावर्षीचा शुभकाळ ८ तास ४२ मिनिटे तर पवित्रकाळ १ तास ४५ मिनिटे आहे. या काळात सूर्यदेवाची पूजा करावी. यावर्षीचे संक्रांत देवतेचे वर्णन असे केलेले आहे की, तिचे वाहन वाघ, आणि उपवाहान घोडा असून, तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. तिच्या हातात गदा हे शस्त्र असून, कपाळावर केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने ती कुमारी व बसलेली स्थिती आणि वासासाठी जाईचे फुल घेतलेले आहे. ती पायस प्राशन करत आहे. सर्प जातीची असून तिचे भूषण – अलंकार मोत्याचे आहेत. वार आणि नक्षत्र नाम ‘महोदरी’ असे आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असून वायव्य कडे पाहत आहे. संक्रांतीच्या पर्वकाळात खोटं, कठोर बोलू नये. गवत, वृक्ष तोडू नये. गाई म्हशींची धार काढू नये. दान करताना नवीने भांड, गोग्रास, अन्न, तिळगुळ घालून पात्र, भूमी, सोन, वस्त्र यथाशक्ती दान करावे. सूर्याच्या उत्तरायाणात मृत्यू आल्यास मोक्ष मिळतो, अशा समजुतीने भीष्मानीही बाणाच्या शैयेवर पडून उत्तरायणाची वाट पाहिली. आणि नंतर संक्रांतीच्या दिवशी देवांना आपला देह दान केला. म्हणून दानाला महत्त्व जास्त आहे. संक्रांतीची सर्व माहिती काल महात्म्यानुसार होणाऱ्या बदलाला अनुसरून असते. हा दिवस भूगोल दिन असून कुंभमेळा प्रथम शाही स्नान दिवस असा आहे.

 संक्रांतीच्या दुसरा दिवस किंक्रांत. या दिवशी देवीने किंकरासुर राक्षसाला

ठार मारले. या दिवसाला ‘करी दिन ‘असेही म्हणतात. भोगी दिवशी पूजा केलेली सुगडी या दिवशी हळदीकुंकू देऊन दान देतात. तसेच भोगीला केलेली बाजरीची भाकरी झाकून ठेवून यादिवशी खाण्याची पद्धत आहे.

 संक्रांतीच्या अशा शुभ, पवित्र आणि गोड दिवशी सर्वांना शाब्दिक तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणूया.

“भास्करस्य यथा तेजो/ मकरस्थस्य वर्धते/

तथैव भवतां तेजो वर्धतामिती कामये/

मकर संक्रांती पर्वण: सर्वेभ्य: शुभाशया://

 ज्याप्रमाणे मकर राशीतील प्रवेशाने सूर्याचे तेज वाढते, त्याप्रमाणे ही मकर संक्रांत तुमचे यश, आरोग्य, धनधान्य रुपी तेज वाढविणारी ठरो.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उत्तरायण… लेखिका : सुश्री धनश्री लेले ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ?

☆ उत्तरायण… लेखिका : सुश्री धनश्री लेले   ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

उत्तरायण… 

नवीन वर्ष सुरु होताना आनंद तर असतोच मनात पण

काळाच्या माळेतला एक एक वर्षरुपी मोती घरंगळत चाललाय…हाही विचार मनात येतो… . खरंतर रोजच दिवसाचा मोती घरंगळतो….  मावळणारा सूर्य रोजच एक मोती घेऊन जातो… आयुष: खंडं आदाय रवि: अस्तं गमिष्यति || हे जितकं खरं तितकंच रवींद्रनाथ म्हणतात तसं, रोजचा सूर्य नवीन, त्याचा लालिमा नवीन, त्याच्या दिशेने आकाशात झेपावणारी पक्ष्यांची रांग नवीन…..

 

जगातली प्रत्येक गोष्ट नवीन आहे , क्षणाक्षणाला बदलणारी आहे,

नाविन्य हा जगाचा प्राण आहे. आकाश जुनं आहे पण त्यावर येणारे मेघ नवीन आहेत. समुद्र शतकानुशतकं तोच आहे पण त्यावर येणारी प्रत्येक लाट नवीन आहे. वृक्ष तेच आहेत पण पालवी नवीन आहे. आणि अध्यातामातलं उदाहरण द्यायचं तर आत्मा तोच आहे , देह मात्र नवीन आहे. हा जुन्या नव्याचा संगम आहे..

 

शायरा संगीता जोशी यांची ओळ आठवते …

तू भेटशी नव्याने …. बाकी जुनेच आहे …

 

सगळं तेच आहे पण दररोज आपण नवीन आहोत का नाही? आपलं मन नवीन आहे कि नाही? आपला उत्साह नवीन आहे का नाही?

 आपण नव्या दमाने नवीन दिवसाचं स्वागत करायला तयार आहोत का नाही?

आपण नवीन होऊन या जगाला भेटायला तयार आहोत का नाही?  हे तपासून पाहायला हवं ….

 

नवीन वर्षाचं स्वागत नव्या उत्साहाने, नवीन आशेने, नवीन स्वप्नांनी आणि नवीन संकल्पांनी करायला हवं …. जणू मागचं विसरून पुन्हा नवीन  होण्याची संधी. . नवीन संकल्पांची नवीन संधी …

 

उत्तरायण सुरु झालंय… या उत्तरायणाचा महिमा केवढा .. इच्छामरणी भीष्म थांबले होते प्राण सोडायचे.

 उत्तरायणात मरण आलं तर चांगली गती मिळते म्हणे … मरणानंतर कशाला ? जगताना हि चांगली गती मिळण्यासाठी उत्तरायणच हवं…

 

 हे उत्तरायण भोगोलिक नाही तर मानसिक हवं. उत्तर किती सुंदर शब्द .. तृ म्हणजे तरणे आणि उद् म्हणजे वरच्या दिशेला वरच्या दिशेने तरुण जाणे म्हणजे उत्तर आणि असा कायम वरच्या दिशेने चालायचा मार्ग {अयन) म्हणजे उत्तरायण सतत वरच्या दिशेने, सतत प्रगतीशील, सतत आपल्यात सुधारणा करीत उच्च ध्येयाच्या उत्तर दिशेने एक एक पाउल टाकणे म्हणजे मानसिक उत्तरायण ! असं उत्तरायण दर दिवशी , दर क्षणी ही होऊ शकतं.

 

मानसिक उत्तरायण घडलं की चैतन्याच्या नद्या प्रवाहित होतात, निरुत्साहाचं बर्फ वितळतं, हिरव्यागार विचारांची पालवी फुटते… आणि मुख्य म्हणजे आनंदाचा सूर्य उगवतो….

 

आनंद हा आपला स्थायीभाव आहे. कारण आपल्या अध्यात्म संकल्पनेनुसार आपल्यात वास करणारं ते चैतन्य म्हणजे सत् चित् आनंद आहे …

आपण आहोत म्हणजे सत्, आपण चैतन्ययुक्त आहोत म्हणजे चित् … आणि आपल्या सगळ्यांना हवा असतो तो आनंद …

 प्रत्येकाच्या आनंदाचं कारण वेगळं, त्याचं प्रमाण वेगळं…. पण सगळ्यांना आपली ओंजळ आनंदाने भरून जावी असंच वाटत आणि .

.हा आनंद आपला आपल्यालाच मिळवायला लागतो… छोटे छोटे खडे भरलेल्या माठात पाणी घातलं तर आधी ते पाणी खाली जातं आणि मग खड्यांच्या फटीतून वाट काढत काढत ते हळूहळू पृष्ठभागावरती येतं.. आनंदाचंही असंच आहे..

 प्रश्न, समस्या, शंका, अडचणी, अडथळे या सा-या खडकांच्या फटीफटीतूनच तो शोधावा लागतो..

मग तो आपसूक मनभर पसरतो, चेह-यावर दिसतो… स्वानंद हाच खरा आनंद …

आपल्या अंगणातलं आनंदाचं झाड सतत बहरात राहो हि शुभेच्छा … नवीन वर्षाच्या शुभेच्छांसहित!

लेखिका सुश्री धनश्री लेले

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares