पण ते कधी कसं केव्हा सोबत घेऊन जाणार हे नक्की कळत नाही माणसाला.
त्याची वाट पहातच जगत असतो माणूस मरेपर्यंत.
पण जन्ममरणाच्या मधल्या काळातली उलथापालथ कधी आनंद देते, तर कधी पिळवटून टाकते मना सोबत तनालाही.
तन माणसाचं आवडत ठिकाण, कारण त्यातच त्याचा आत्मा असतो. तो त्याला बाह्यात्कारी सजवण्यातच आयुष्य खर्ची घालतो. कारण मनाचा तसाच हुकूम असतो. मेंदू मनाचा गुलाम पण देहावरचा शासनकर्ता. मग मनाचा आदेश धुडकावून लावण्याची त्याची कुठे हिंमत चालते.
मन मुलखाचेओढाळ, त्याला आवरघालणे महाकठीण. या सगळ्या गुंत्यात मनाचेच फावते. ते सगळ्यांची भंबेरी उडवून देते. आणि जगण्याचाच बट्याबोळ करून टाकते. म्हणूनच आत्मा आणि मन यांचा वितंडवाद मिटवण्यासाठी करगर उपाय शोधून ते अमलात आणावे लागतात. पण हे कामही सोपे नसते. त्यासाठी मनालाच मारावे लागते. खडतर तप साधना करावी लागते. आत्मबल एकवटावे लागते. आणि निर्णय घ्यावे लागतात. तसे केले तरच माणसाला च्यारीत्र्य प्राप्त होते व माणूस इतरांपेक्षा वेगळा ठरतो. वागतो. नाहीतर सामान्य राहूनच निघून जातो जगातून. म्हणूनच मनावर काबू मिळवा आणि जगासमोर चांगला माणूस म्हणून मिरवून निघून जा, शांतपणे. एका माहित नसलेल्या अनोळखी विश्वात.
आपले जगत्गुरू तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. तुकारामांइतका सच्चा गुरू असूच शकत नाही, कारण संसारतापात होरपळून तावूनसुलाखून निघालेला त्यांच्या सारखा क्वचितच कुणी असेल. त्यामुळे त्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येकच शब्द अनुभवाचे अमृत आहे.
या पूर्ण अभंगातून त्यांनी “मनाची” महती सांगितली आहे. ताकद ही अंगात नसते डोक्यात,
मनात असते. तुम्ही एकदा, म्हणजे तुमच्या मनाने एकदा ठरवले की, ही गोष्ट करायचीच,
तर ती पूर्णत्वाला जाते म्हणजे जाते. निश्चय मात्र मनाचा पक्का हवा. म्हणूनच दोन मल्लांमधला बारक्या मल्ल सुद्धा कुस्ती जिंकतो कारण त्याच्या मनाचे डावपेच पक्के असतात, तो ते बिलकूल विसरत नाही व संधी मिळताच प्रतिस्पर्ध्याला चीतपट करतो. कारण त्याची ताकद डोक्यात असते, तो डोक्याने कुस्ती खेळतो.
म्हणून तुकाराम म्हणतात, मनाची पूजा करा.
मन हेच सर्व सिद्धीचे कारण आहे. तुम्ही ठरवले तर ते मोक्ष देईल तुम्ही म्हणाल तर बंधनात राहील. काय करायचे ते तुम्ही ठरवा. मन सुख देईल, समाधान देईल, तुमच्या सर्व इच्छा देखील पुरविल. फक्त काय हवे त्याची प्रतिमा मनात स्थापन करा. एकदा तुमचे ध्येय निश्चित झाले की, तुमची त्या दिशेने वाटचाल झालीच म्हणून समजा. कारण काय करायचे याची प्रतिमा तुमच्या मनात पक्की असते.
“मने मना पूजा केली.. “ वाह वा क्या बात है..
मनाने मनाची पूजा करा. मन खुश होते. आणि मग मनच तुमची इच्छा पुरविते. तुकाराम म्हणतात, अहो, मन सद् गुरू आहे. मन माऊली आहे. वाह वा… मन माऊली आहे. माऊली तर मग साऱ्या इच्छा पुरवतेच ना? मन गुरूही आहे नि शिष्यही आहे. ते आपले दास्यत्व पत्करते.
आपल्याला प्रसन्न ठेवते नि गती अथवा अधोगतीही देते. साधक, वाचक, पंडित हो ऐका.
मनासारखा दुसरा गुरू नाहीच. नाही, नाही, अहो मना सारखे दुसरे दैवत नाहीच.
पण हेच मन भगवंतासाठी आसुसलेले असतांना या मनाला वठणीवर आणायला तुकारामांना
काही कमी प्रयास पडले नाहीत? फार कष्टवले त्यांना समतोल बुद्धी येण्यासाठी. शेवटी भंडारा डोंगरावर जाऊन त्यांनी तपश्चर्या केली, तेव्हा कुठे ते वठणीवर आले. म्हणूनच ते म्हणतात, मनाची पूजा करा. भंडाऱ्यावर त्यांना विठ्ठल पावला नि मुखातून शब्द उमटले..
“आनंदाच्या डोही आनंद तरंग
आनंदची अंग आनंदाचे….
काय सांगू झाले काहींचिया बाही…
अहो, काहीच्याकाहीच झाले हो.. मला विठाई पावली हो… अंतर्बाह्य ते आनंदात न्हाऊन निघाले. ”पुढे चाली नाही आवडीने”..
आता मला कामच उरले नाही, मला विठाई भेटली. माझे ध्येय साध्य झाले.
एकदा तुमच्या मनाने ध्येय ठरवले की तिकडेच वाटचाल होते, मग ते कितीही कठीण असो.
म्हणूनच.. “ ऐकावे जनाचे, करावे मनाचे”
उगाच नाही सांगून गेले मोठे लोक. महत्वाचा संदेश काय आहे? मंडळी… तर मन प्रसन्न ठेवा.
कसे राहते ते? दुष्ट विचार करायचेच नाहीत ना?
जोवर तुम्ही दुसऱ्याचे वाईट चिंताल तोवर ते दुष्टच असणार? दुष्ट मनात दुष्ट विचार? मग ते कसे प्रसन्न राहील हो? हो ना? म्हणून आधी दुष्ट विचार झटकायचे? कोणाचे काय चालले आहे हे बघायचेच नाही हो! आपल्याला काय करायचे ते ठरवायचे. कुणी? आपल्या मनाने. मग ते स्वच्छ हवे ना? त्या शिवाय कसे कल्याण होणार हो? तुम्ही जो विचार करता तसेच घडते हे शास्र आहे. चांगले विचार करणाऱ्याचे कल्याणच होते.
हा माझा तर अनुभवच आहे. म्हणूनच सकारात्मक रहा असे तुकाराम सांगतात.
हो, “ निंदकाचे घर असावे शेजारी” का? त्यामुळे आपल्याला आपल्या चुका कळतात व आपल्यात सुधारणा होतात. त्यांना खुशाल निंदा करू द्यावी, मनाला शांतच ठेवावे. उत्तरच देऊ नये.
कशाला आपली तडफड करून घ्यायची फुकटची! म्हणून, तुकाराम महाराज म्हणतात, समतोल बुद्धिच्या माणसाला शत्रू.. मित्र, माती.. सोने सारखेच असते. ही समतोल बुद्धी येण्या साठीच मनावर ताबा मिळवता आला पाहिजे.
मग कशानेही फरक पडत नाही. आपल्याला तुकाराम होता येणार नाही मंडळी, निदान त्यांच्या पायाची धूळ होऊ या.
☆ हिंदू वर्षातील पहिला सण.. गुढीपाडवा☆ सौ शालिनी जोशी ☆
चैत्र प्रतिपदेपासून वसंत ऋतू सुरू होतो. त्यामुळे धार्मिक सण आणि वसंताच्या आगमनाचा आनंद म्हणजे गुढीपाडवा. वसंतही भगवंतांची विभूती, ते म्हणतात, ‘अहमृतूनां कुसुमाकरः।’ वसंतऋतूला कुसुमाकर किती सुंदर शब्द आहे नाही ? चैतन्याची अनुभूती देणाऱ्या वसंताचा हा पहिला दिवस. होळीला दुष्ट प्रवृत्तीचा नाश शिकवल्यावर सुष्ट प्रवृत्तीचे वर्धन आणि जयजयकार सांगणारा हा दिवस. रूढीच्या निमित्त्याने निसर्गाचे रक्षण आणि सत्प्रवृत्तीचे वर्धन यातून आपल्या पूर्वजांनी शिकवले.
गुढीच्या काठीवर पालथा घालतात तो धातुचा गडू हे विजयश्रीचे व सामर्थ्याचे प्रतिक. जसे राजाच्या डोक्यावर किरीट असते. या दिवशी कडुलिंबाचे विशेष महत्व. तो गुढीला बांधतात तसेच जेवणात त्याची चटणी खातात. त्याच्या अंगच्या औषधी गुणधर्मामुळे उष्णता कमी होते, पचन सुधारते, पित्ताचा नाश होतो, त्वचेचे आरोग्य सुधारते. याच्या सर्वच भागांचा औषधात उपयोग. म्हणून कडुलिंबाचे सेवन एका दिवसापुरते नसून वर्षभर व्हावे हे सुचवायचे आहे. आंब्याची डहाळी म्हणजे मांगल्य आणि चैतन्य, तर फुले म्हणते कोमलता हे गुण आपण अखंड जोपासावे. साखरेच्या गाठीची मधुरता वाणीत असावी. कोणत्याही कर्मा मागील संकल्प (विचार )म्हणजे सुपारी आणि मग सिद्धी रुपी श्रीफळाचा लाभ होतो. हळदी कुंकवासारखे सौभाग्य आणि रांगोळीचे मांगल्य प्राप्त होते. त्यासाठी मुख्य गरज पाठासारख्या स्थैर्याची आणि काठीच्या काटकपणाची. हे सर्व साधले तर विजयश्री नक्कीच प्राप्त होते. पण येथे नम्रता महत्त्वाची, जी गुडी तिरपी करून व्यक्त केली जाते. अशा प्रकारे यशासाठी आवश्यक सगळ्या गुणांचे हे प्रतीक. यशा बरोबर वैभवाची गरज सुचवितो जरीचा खण आणि गुडीची उंची म्हणजे श्रेष्ठ यशाची अपेक्षा. अशी ही गुढी वर्षारंभी पुजायची, गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा आणि पुढे घेणाऱ्या वसंतोत्सवाचा आनंद निसर्ग रक्षणांनी घ्यायचा. हाच गुढीपाडवा.
गुढीची पूजा केल्यावर प्रार्थना म्हटली जाते ‘ ओम् ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद। प्राप्तेsस्मिन् संवत्सरे नित्यमं मंगलमं कुरु।
नवीन वर्षाची सुरुवात असल्यामुळे नव्या पंचांगाची पूजा या दिवशी करतात. पुढे येणाऱ्या रामनवमी चे नवरात्र याच दिवशी सुरू होते.
आता पाडव्याला मिरवणुका, संगीताचे कार्यक्रम असे सार्वजनिक कार्यक्रमही होतात. एकंदरीत वर्षाची सुरुवात आनंदाने व्हावी व तो आनंद वर्षभर टिकवा ही इच्छा.
☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – संत जनाबाई… भाग – २ ☆ सौ शालिनी जोशी ☆
‘नामयाची दासी’ म्हणून बिरुद मिरवणारी जनाबाई मुक्ताबाईंचे समकालीन. जन्म अंदाजे इ. स. १२६० ते १२७०. गोदावरी तीरावरील गंगाखेडच्या दमा (वडील) आणि करुंड (आई )या भगवत् भक्त दांपत्याचे मुलगी. जातीने शूद्र पण आई-वडील पंढरीची वारी करणारे होते. लहानपणीच आई-वडील दुरावले. पाच वर्षाची अनाथ पोर जना नामदेवांचे वडील दामाशेठ शिंपी यांच्याकडे राहिली. देवाची आवड आणि लाघवी स्वभाव यामुळे त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य झाली.
नामदेवांच्या घरातील अंगण, तुळशी वृंदावन, शेणगोवऱ्या वेचण्याची जागा, कोठार, माजकर हेच त्यांचे विश्व बनले. तिथेच त्यांना परमेश्वर दिसला. त्यांचे मन एवढे विशाल झाले की दळणकांडण, धुणीभांडी सडासारवण ही त्यांची कष्टाची कामे देवाचीच झाली. काम करताना विठ्ठलाच्या नामात त्या इतक्या तल्लीन होत की देवच काम करतो हा भाव निर्माण होई. त्यामुळे त्या म्हणत,
झाडालोट करी जनी l केर भरी चक्रपाणी l
पाटी घेऊनिया शिरी l नेऊनिया टाकी दूरी l
ऐसा भक्तिसी भुलला l नीच कामे करू लागला l
जनी म्हणे विठोबाला l काय उतराई होऊ तुला l
दासीपणा आणि अलौकिकता यांचा समतोल त्यांनी साधला.
द्वैतातील काम करताना अद्वैताचा आनंद त्यांनी अनुभवला आणि अद्वैताचा आनंद द्वैतात भोगला. त्यामुळे वास्तव जीवनातले श्रम हे त्यांच्यासाठी क्रीडा झाले. म्हणून त्या म्हणतात,
दळू कांडू खेळू l सर्व पाप ताप जाळू l
सर्व जीवांमध्ये पाहू l आम्ही एक होऊनि राहू l
जनी म्हणे ब्रह्म होऊ l सर्वाघटी ब्रह्म पाहू l
कर्माला क्रीडेचे रूप मिळाले की त्यातील पाप, ताप, दाह सर्व लोपतात. सर्वत्र ब्रह्मच दिसते.
संत नामदेवामुळे ज्ञानेश्वर, विठोबा खेचर, सोपान, चोखोबा, गोरा कुंभार, अशा संत मंडळींचा सहवास जनाबाईंना लाभला. ज्ञानेश्वरांविषयी जनाबाईंना विशेष आदर होता. ‘परलोकीचे तारूl म्हणे माझा ज्ञानेश्वरु’ असे त्या म्हणत असत. नामदेवांसारख्या गुरूचा अखंड सहवास त्यांना लाभला. त्यामुळे गुरुमंत्र घेण्याच्या उपचाराची गरज भासली नाही. संत नामदेव उत्तर, दक्षिण भारतात तीर्थयात्रेसाठी गेल्यावर वारकरी संप्रदायाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. साधारण ३५० अभंग त्यांनी लिहिले. कविता, आरत्या, ओव्या, पाळणे, पौराणिक कथा यांचा समावेश त्यांच्या काव्यात आहे. चरित्रे, उपदेश, भारुडे अशा रचनाही केल्या. अध्यात्मातील योगसाधना आत्मसात करून ज्ञानोत्तर भक्तीचा स्विकार केला.
‘स्त्री जन म्हणूनि न व्हावे उदास’ असे सांगून स्त्रियांना नवीन वाट दाखवली. स्वतः अविवाहित राहिली. विठ्ठलाचे मानुषीकरण करून त्याला माय, बाप, सखा, सांगाती असे संबोधले. नि:संग, त्यागी वृत्ती, निर्भयता, सहनशिलता, वात्सल्य, समर्पण हे भाव त्यांचे ठिकाणी होते. तरीही समाजकंटकांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. एकदा विठोबारायाचा कंठा चोरल्याचा आळ बडव्यानी जनाबाईंवर घेतला. त्यांना सुळी देण्याचा प्रयत्न केला. पण तो फसला. सुळच विरघळला. जनी परीक्षेत उतरली.
नामदेवाच्या कुटुंबातील अन्य कुणालाही संत संबोधले गेले नाही. पण दासी असणाऱ्या जनाबाईला तो मान मिळाला. नामदेवांच्या घरी सर्वच विठ्ठल भक्त. त्यांच्याविषयी सांगताना जनाबाई म्हणतात,
नामदेवाचे घरी l चौदाजणे स्मरती हरी l
चौघे पुत्र चौघे सुना l नित्य स्मरती नारायणा l
आणिक मायबाप पाही l नामदेव राजाबाई l
आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी lपंधरावी ती दासी जनी l
विरोधी भक्तीने कधी विठ्ठलाला जनाबाईंनी शिव्याही घातल्या. उद्वेगाने त्यांनी म्हटले ‘अरे विठ्या अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या l’ तशाच त्यांनी विराण्याही रचल्या. अशा ह्या जनाबाई लोकांच्या स्तुतीनिंदेच्या पलीकडे जाऊन भक्तीचा प्रसार करणाऱ्या होत्या. दीर्घायुष्य भोगून नामदेवांच्या बरोबर विठ्ठलाच्या पायरीत अंतर्धान पावल्या. (शके १३५०).
तरीही ‘विठू माझा लेकुरवाळा’ अशी जनाबाईंची मायाळू व प्रेमळ साद आणि मातृका विठाबाईचे व तिच्या संत लेकरांचे जनाबाईने रेखाटलेले भावविश्व जनाबाईंना अमर करते.
(पूर्वसूत्र- जोशीकाकांना भेटण्यासाठी अशोक जोशी आग्रहाने मला प्रवृत्त करतात काय आणि स्थलांतराचा योग नसल्याचा दिलासा देत, माझ्या आयुष्यात अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांची काहीही पूर्वकल्पना नसतानाही
जोशीकाका समीरच्या जन्म आणि मृत्यूची सांगड सहजपणे घालत असतानाच त्यातून माझ्या बाबांच्या पुनर्जन्माचे सूचन करुन मला विचारप्रवृत्त करतात काय,… सगळंच अघटित, अतर्क्य आणि मनातल्या अनुत्तरीत प्रश्नांची नकळत उत्तर देतादेताच मनात नवीन प्रश्न निर्माण करणारंही! हे सगळं मला दिलासा देण्यासाठी ‘त्या’नेच घडवून आणल्याचं मला लख्खपणे जाणवलं आणि मनातलं मळभ हळूहळू विरु लागलं!!)
जोशी काकांकडून परतल्यानंतर त्या रविवारी घरी अर्थातच चर्चेला विषय होता तो हाच. पण तिथं काय घडलं, ते काय म्हणाले या सगळ्याची मला सविस्तर चर्चा करणं नकोसंच वाटलं. कारण ते जुन्या जखमांवरची खपली काढल्यासारखंच झालं असतं. पण कांही न सांगणं, गप्प बसणं योग्यही वाटेना आणि शक्यही. कारण पत्रिका आणि ज्योतिष यावर आरतीचा कितीही विश्वास नाही असं म्हंटलं तरी तिथं नेमकं काय झालं याबद्दल तरी तिला उत्सुकता असणं स्वाभाविकच होतं.
“आपलं रुटीन फारसं डिस्टर्ब होणार नाही असं त्यांचं रिडिंग आहे” असं मोघम सांगून मी विषय सुरु होताच संपवायचा प्रयत्न केला खरा पण तो संपला नव्हताच.
” तुम्हाला खरंच पटतंय हे? खरंच वाटतंय असं होईल?”
“माझ्यापुरतं म्हणशील तर केव्हा काय होईल ते सांगता येणार नाही हेच खरं. ” मी हसत म्हंटलं. या संदर्भातील सगळ्याच चर्चांना पूर्णविराम देऊ शकेल असं हेच एकमेव समर्पक उत्तर माझ्याजवळ होतं!
खरं सांगायचं तर जोशीकाकांनी जे सांगितलं त्यात माझ्यापुरतं तरी न पटण्यासारखं कांही नव्हतंच. याचं कारण म्हणजे माझ्या आयुष्यातल्या भूतकाळातल्या घटनांचे त्यांनी अंदाज घेत कां असेना पण दिलेले अचूक संदर्भ! माझ्या अंतर्मनाने ते केव्हाच स्विकारले होते खरे, पण त्यावरही खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब होणार होतं ते माझी प्रमोशन पोस्टींगची आॅर्डर आल्यानंतरच!
पण त्यासाठी फार काळ वाट पहावी लागलीच नाही. सगळ्याच रहस्याचा भेद चार दिवसांत लगोलग झालाच. त्या दिवशीच्या इनवर्ड मेलच्या गठ्ठयांत सेंट्रल आॅफीसकडून आलेलं एक एन्व्हलप माझ्या नावावर होतं! मनात चलबिचल नव्हती, साशंकता नव्हती, जे होईल ते चांगलंच होईल हा विश्वास होता आणि जोशी काकांकडून मिळालेले संकेतही या सगळ्याला पूरकच होते.. आणि तरीही.. ते बंद एन्व्हलप हातात घेताच माझे हात थरथरू लागले… ! ती थरथर भीतीची होती कि उत्सुकतेची हे त्या क्षणी जाणवलंच नाही लगेच कारण मन त्या क्षणांत कणभरही रेंगाळलं नव्हतंच. एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखं वरवर शांत पण आतून उतावीळपणानं ते एन्व्हलप मी घाईघाईने फोडलं आणि पाहिलं तर आत माझ्याच नावाची पोस्टींग कम ट्रान्सफरची ऑर्डर होती! त्यातल्या चार ओळी माझं रुटीन पूर्णत: उलथंपालथं तरी करणार होत्या किंवा सावरणार तरी…. !
मी ती आॅर्डर वाचताच ‘त्या’नेच घडवून आणलेल्या त्या अद्भूत चमत्काराने मनोमन सुखावलो. ‘त्या’नेच जोशीकाकांच्या तोंडून वदवलेलं माझं भविष्य त्या ट्रान्स्फर आॅर्डरमधील शब्दरुपात माझ्या नजरेसमोर जिवंत झालेलं होतं!!…. होय. माझं पोस्टिंग लखनौला नव्हे तर आमच्या याच
रिजनमधल्या इचलकरंजी मुख्य शाखेत ‘हायर ग्रेड ब्रॅंच मॅनेजर’ म्हणून झालेलं होतं! ‘त्या’च्या आशीर्वादांच्या त्या
शब्दरूपावरून फिरणारी माझी नजर आनंदाश्रूंच्या ओझरत्या स्पर्शानेच ओलसर झाली… ! स्वप्नवतच वाटत राहिलं सगळं !! पण…. मी स्वतःला क्षणार्धात सावरलं. शांतपणे डोळे मिटून घेतले… ‘त्या’ला मनोमन नमस्कार केला… डोळ्यातून वाहू पहाणारा आनंद डोळे क्षणभर तसेच मिटून आतल्या आत जिरवला. अलगद डोळे उघडले न् त्या क्षणी आठवण झाली ती मला मनापासून सहकार्य करणाऱ्या, माझ्या भवितव्याची चिंता लागून राहिलेल्या माझ्या ब्रॅंचमधील स्टाफमेंबर्सची! ते सर्वजण आपापल्या कामांत व्यस्त होते तरीही माझा आनंद आत्ताच सर्वांमधे वाटून मला द्विगुणित करायचा होता! त्याच असोशीने दुसऱ्याच क्षणी मी केबिनचं दार ढकलून बाहेर आलो.. !
त्यादिवशी लंचटाईममधे डायनिंग टेबलवर आणि पुढे दिवसभरही ‘ हे आक्रित घडलं कसं?’ हाच सर्वांच्या चर्चेचा मुख्य विषय होता! माझ्यापुरता तरी तो चमत्कारच होता पण तो घडला होता तो मात्र कुणी घडवल्यासारखा नाही तर सहज घडल्यासारखा!! यामागील कार्यकारणभावाची जी उकल पुढे एक दोन दिवसातच झाली, तीही कुणालाही अगदी सहजपणे पटावी अशीच होती!
खरंतर यावेळच्या प्रमोशन पोस्टींगसाठी सेंट्रल-ऑफिसने ठरवलेल्या पाॅलिसीनुसार सर्वच प्रमोटी-आॅफिसर्सची पोस्टींग्ज कोणताही अपवाद न करता आऊट आॅफ स्टेटच होतील असेच ठरले होते. त्यानुसार कुणाचे पोस्टींग कुठे करायचे याबाबतच्या निर्णयावर जी. एम्. नी सह्याही केल्या होत्या. त्याप्रमाणे कोल्हापूर रिजनमधील आम्हा सर्व प्रमोटीजची उत्तर-प्रदेश मधील शाखा किंवा अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेसमधे ट्रान्स्फर करण्याचा निर्णय झालेला होता आणि त्यानुसारच माझं पोस्टींग रिजनल ऑफिस, लखनौला होणार असल्याची ती बातमी अशी पूर्णत: सत्याधिष्ठीतच होती! असं असतानाही पुढच्या चार सहा दिवसात अशा कांही घटना आकस्मिकपणे घडत गेल्या की सेंट्रल ऑफिसला या प्रमोशन ट्रान्सफर पॉलिसीबाबत तडजोड करणे भाग पडले होते. कारण इकडच्या रिजन्सच्या तुलनेत बॉम्बे रिजनमधील प्रमोटिजची संख्या कितीतरी पटीने जास्त होती. त्या मुंबईस्थित सरसकट सगळ्यांनाच प्रदीर्घ काळासाठी घरापासून परप्रांतात एकटंच निघून जाणं केवळ गैरसोयीचंच नव्हे, तर अनेक दृष्टीने अडचणीचेही ठरणारे होते. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन युनियनकडे लेखी तक्रारी दिल्या. आणि अर्थातच त्यामुळे युनियन हेडक्वाॅर्टर्ससाठी हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनला. त्यांनी बॅंकेच्या सेंट्रल-मॅनेजमेंटकडे हा विषय लावून धरला आणि त्यांच्या मिटिंगमधे झालेल्या चर्चांमधे ही पॉलिसी कांही प्रमाणात शिथिल करण्याची मॅनेजमेंटने तयारी दाखवली. त्यानुसार ऑलओव्हर इंडियाच्या, मेरीटनुसार बनवलेल्या हजारभर प्रमोटींच्या लिस्टमधे पहिल्या शंभरात नावे असणाऱ्या प्रमोटीजना त्यांच्या सध्याच्या रिजनमधेच पोस्टिंग द्यायचे आणि बाकी सर्वांचे मात्र ठरल्याप्रमाणे आऊट ऑफ स्टेट पोस्टींग करायचे अशी तडजोड मान्य झाली. आश्चर्य हे कीं त्या मेरिट-लिस्टमधे माझा नंबर ९८ क्रमांकावर होता! म्हणूनच केवळ माझं लखनौचं पोस्टिंग रद्द होऊन ते इचलकरंजी (मुख्य) ब्रँचला झालं!!
माझा पौर्णिमेचा नित्यनेम आता निर्विघ्नपणे सुरु रहाणार असल्याचा खूप मोठा दिलासा मला प्रमोशन नंतरची नवीन जबाबदारी स्वीकारण्यासाठी अतिशय आवश्यक असं मानसिक स्वास्थ्य देणारा ठरला ही ‘त्या’चीच कृपा होती हे खरंच पण त्यापेक्षाही माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं होतं ते जन्म आणि मृत्यू या दोन्हींकडे वेगळ्या आणि अधिक समतोल नजरेने पहायची मला मिळालेली नवी दृष्टी! अर्थात जोशीकाका याला निमित्त झाले होते हे खरेच पण त्यामागचा कर्ता-करविताही ‘तो’च होता आणि हे माझ्यासाठी अधिक मोलाचं होतं! म्हणूनच जन्म आणि मृत्यूला जोडणाऱ्या पुनर्जन्माच्या बंद दरवाज्याची दारं कांही अंशी तरी किलकिली झाल्याचा आभास माझ्या मनात कांहीकाळ निर्माण झाला तरी त्यात मी फार काळ रुतून बसलो नाही. यातून समीर गेल्याचं दुःख बऱ्याच प्रमाणात बोथट झालं हे एक आणि या ना त्या रुपांत बाबांची दिलासा देणारी सावली सिलिंडरच्या रूपात माझ्यासोबत आहे ही कधीच न विरणारी भावना आजही तितक्याच अलवारपणे माझी सोबत करते आहे हेही माझ्यासाठी फार मोठा दिलासा देणारेच ठरले आहे.
माझ्या आयुष्यात त्या त्या क्षणी मला अतीव दु:ख देऊन गेलेले, माझे बाबा आणि समीरबाळ यांचे क्लेशकारक मृत्यू त्यांच्याशीच निगडीत असणाऱ्या या सगळ्या पुढील काळांत घडलेल्या घटनांमुळे माझं उर्वरीत जगणं असं अधिकच शांत, समाधानी आणि अर्थपूर्ण करणारेच ठरले आहेत. ‘त्या’चा कृपालोभ यापेक्षा वेगळा तो काय असणार?
हे सगळं त्याक्षणी पूर्ण समाधान देणारं असलं तरी हा पूर्णविराम नव्हता. पुढील आयुष्यांत असे अनेक कसोटी पहाणारे क्षण आपली वाट पहातायत याची मला कल्पना नव्हती एवढंच!
☆ आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
२० मार्च, आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस! २००६ ते २०१२ या काळात संयुक्त राष्ट्रांनी एक मोहीम चालवली. २०११ मध्ये या दिवसाची कल्पना मांडली. आणि २०१३ मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला. याचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचावे म्हणून विविध प्रकारचे प्रयत्न करण्यात आले. यात लोकांना आनंदाचे महत्व पटवणे. आपले काम करताना आपण आनंदी असलो तर त्याचे होणारे फायदे प्रत्यक्ष दाखवले गेले. त्याच प्रमाणे विविध वेळी, विविध ठिकाणी आपण आनंदी मनोवृत्ती ठेवली तर कोणते फायदे होतात ते सांगितले गेले. त्या साठी कोणत्या कृती कराव्यात हेही सांगितले गेले. मानवी विकासासाठी आनंद किती महत्त्वाचा असतो याचेही महत्व विषद करण्यात आले.
हे सगळे करण्याची आवश्यकता का वाटली असेल? याचा विचार केला तर काही लोकांची मते, किंवा कामाच्या ठिकाणी आनंदी असणे, घरात आनंदी असणे याचा फारसा स्वीकार केला गेला नव्हता. जे आनंदी दिसत असत त्यांना नावे ठेवली जायची. आनंदाने किंवा हसऱ्या चेहऱ्याने काम करणाऱ्या व्यक्ती म्हणजे त्यांना कोणतीच गंभीरता नसते, ते कोणतेही काम नीट करू शकणार नाहीत असेही गैरसमज होते. कोणतेही काम गंभीरतेने, तणावपूर्ण केले तरच ते प्रामाणिकपणे व व्यवस्थित होते. असेही गैरसमज होते. प्रत्यक्षात काही निरीक्षणे, अनुभव व काही सर्व्हेक्षण केल्यावर असे लक्षात आले, की आनंदी मनाने काम केले तर ते अधिक चांगले होते. आणि करणाऱ्यालाही त्याचा आनंद मिळतो. आनंदाचा संबंध कल्याण व एकूण जीवनातील समाधानाशी जोडलेला असतो. ज्यांची आनंदाची पातळी जास्त असते त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असते. त्यांचे सामाजिक संबंध मजबूत असतात. प्रतिकूल परिस्थितीला ते तोंड देऊ शकतात.
आनंदाची कोणतीही ढोबळ व्याख्या करता येत नसली तरी त्यात सकारात्मकता ही भावना, उद्देशाची व परिपूर्णतेची भावना अशी मनाची स्थिती दिसून येते. अर्थात प्रत्येकाची आनंदाची व्याख्या व ज्यातून आनंद मिळतो या विषयी दृष्टिकोन भिन्न असतो. आणि वयाच्या प्रत्येक टप्प्यावर हा आनंद बदलत असतो. हा एक वेगळाच विषय आहे.
पण आनंदी राहिल्याने आपल्या कडून समोरच्याला नक्कीच आनंद मिळतो. त्याच्या पर्यंत त्या आनंद लहरी पोहोचतात. खरे तर ही आनंदाची भावना प्रत्येक सजीवात असते. आणि तो व्यक्त करण्याची किंवा ते आनंदी आहेत हे ओळखण्याची पद्धत वेगळी असते. हा आनंद पण असा असतो, तो आपल्याला मिळावा असे वाटत असेल तर तो दुसऱ्यांना द्यावा लागतो. म्हणजे आपला आनंद द्विगुणित होतो. आणि मग आनंदी आनंद गडे, जिकडे तितके चोहिकडे असे होऊन जाते.
आजच्या आनंदाच्या दिवसाच्या उत्सवात आपणही सहभागी होऊ या! स्वतः आनंदी होऊन इतरांनाही आनंदी करु या!
मैफल सांगतेकडे आलेली. रात्र रात्र गायन वादनानी भारलेला मांडव…. स्वरांचंच साम्राज्यच पसरलेलं…. आताही रंगमंचावर ते चार तानपुरे… सारेच आत्यंतिक सुरेल… दोन काळे.. खूप साऱ्या नक्षीनं, मीनाकारीनं सजलेले… दोन अगदी नीतळ, साधे… पण चौघांची भाषा एकंच… गुंजारव ही तोच…. “सा”… “षडज्”…. फक्त तोच मांडवभर पसरलेला… कानाकोपऱ्यात… कनातीच्या रंगीत झुलत्या कापडात… मंदशा अगणित दिव्यांच्या प्रकाशात…. फक्त “सा”…. अजून गाणं सुरूच नाही झालेलं…. पण ते जुळलेले तानपुरे, तो षड्जाचा गुंजारवही अनुभूती देतो वेगळीच…. ते जव्हारदार, घुमारदार, मधुर, निषादात बोलणारे तानपुरे भारावून टाकतात…. उमटतं राहतात षड्जाची आवर्तनं…. लाटा… ती पहाट वेळा… कोवळी किरणं अजून क्षितीजाच्या किनाऱ्याकडे…. मंडपाजवळच्या मंदिरातून काकड आरतीची अस्पष्ट घंटा… तरंगत येणारा उदबत्तीचा मंद दरवळ…. आणि मांडवात फक्त “सा” भरुन राहिलेला… आधार स्वर… साऱ्या स्वरांचं मूळ.. उगमस्थान.. सा.. “साधार “…. तो “साकार”करतो राग चित्र… तो “सामर्थ्य” सप्तकाचं… तो सारांश.. स्वरार्थ… संगीतार्थ
“सा” महत्वाचाच…. इथूनच निर्माण होणार प्रत्येक स्वरांचा आत्मा.. या “सा” चं सर्व स्वरांशी घट्ट नातं, दृढ भावनिक मैत्री…. आणि साऱ्या स्वरांनाही याचीच ओढ.. साऱ्या श्रुती, स्वर… साऱ्यांचे इथेच समर्पण…. आणि त्या अथांग स्वरसागराला सामावून घेणारा “सा”…. शांत…. मंद्र, मध्य, तार सगळीकडे तसाच….
“सा” ला माहिती आहे प्रत्येक स्वर कुठे आहे… कसा आहे… किती आहे… कधी भेटणार आहे…. ते सारे स्वर एकमेकांच्या संगतीनं सजतात.. राग घडतो.. फुलतो… सजतो…
दरवळतो…. सारं सतत “सा “मधे विलीन होत राहतं… खरंतर हा अचल… योग्यासारखा… मास्टर दिनानाथ म्हणंत तसे साधुपुरूष… स्थिर आपल्या जागी… तो मूलभूत आधार संगीताचा… ठाम… निश्चल…
पण तो स्वरांचा, रागांचा भाव जाणतो. प्रत्येक रागाच्या स्वरांना हवं असेल तसा वागतो. ना तो कोमल.. ना तो तीव्र… पण तो कधी हळवा होतो कधी लख्ख ठाम…. राग रूपाच्या भावनेत, रागाच्या लयीत, स्वरवाक्यांच्या वजनात अगदी एकरूप होत राहतो. आपलं अटल स्थान राखंत स्वरांचा सन्मान करतो. रागरुप जपत मंद्र, मध्य, तार सर्व सप्तकात राहतो.
“सा” सात स्वरांचा जनक… पु ल म्हणतात शारदेचं वस्त्र धवल आहे ते रंगहीन म्हणून नाही तर सात रंगांचा मिलाफ होऊन होणारा शुभ्र आहे तो. एका थेंबातून सात रंगांचे किरण फुटतात आणि परत धवल रंगात विलीन होतात… तसंच आहे ना सप्तकाचं…. सा आधार सप्तकाचा… स्वरनिर्माता.. पण त्याला अहं नाही. तो असणारच असतो पण सतत समोर येऊन दाखवत रहात नाही… स्वरांना सजू देतो… रमू देतो.. रंगू देतो कारण त्याला माहिती आहे ते सारे त्याच्यापाशीच परत येणार आहेत. तो त्यांच्या सहज सोबत असतो अदृश्यपणे…. कोमल, शुद्ध, तीव्र साऱ्यांच्या भावनांसोबत असतोच तो… कधी कधी तर राग रचनेत, चालीत कुणी स्वर वर्ज्यही असतात… पण म्हणून नातं तुटतं नाही. सुटत नाही “सा” चं… ते तेवढ्यापुरते दुरावतात आणि दुसऱ्या वेळी प्रधानही होतात. हे सारं “सा” मनात जाणतो. ते सोबत असोत नसोत हा सदैव संगतीला असतोच… ते नसले तरी इतर स्वरांची नाती जपतो…. “सा” शांतपणे सारं ऐकतो, पाहतो, जपतो, सांभाळतो… त्याला दृढ विश्वास आहे सारे भाव, रस, रंग, श्रुती कितीही सजले तरी त्यांना ओढ आहे त्या अचल “सा” ची…. जिथून प्रवास सुरू तिथेच समर्पण आहे… तो समजुतदार “सा” सर्वांना आपल्या मायेच्या दुलईत घेतो….
प्रत्येक स्वर वेगवेगळे भाव भेटवतो… राग सजवतो… “सा” आपल्या जागेवरून सारं न्याहाळतो…. कल्याणच्या गंधार तीव्र म निषादाची मैत्री.. बिहागच्या दोन मध्यमांचं अद्वैत आणि गंधाराचा सुवास… बागेश्रीच्या कोमल गंधार निषादावर धैवताची मध्यमाची सत्ता, त्याच कोमल निषादाशी रागेश्रीतलं शुद्ध ग चं जुळलेलं सूत… रात्रीकडे अलगद पाऊल टाकणारा मारव्याचा कोमल रिषभ पहाटे भैरवाच्या सूर्याला अर्ध्य देतो. करूण रहात नाही तर उदात्त होतो… ऊन्ह तापतात… माध्यान्हीला शुद्ध सारंगचा चढा पण काहिसा करूण तीव्र म शुद्ध मध्यमाच्या प्रभावात वावरतो…. तिलककामोदचे स्वर गंधाराची आर्जवं करतात… जणू काही ग जवळ भेटू असं ठरलंय सगळ्यांचं… अगदी “सां प”ही मींड देखील… किती रागांचे किती खेळ… काही स्वरांना खूप महत्व… तर काही फक्त रागात असतात. ते नसून चालंत नाही आणि आहेत म्हणून फार सन्मान ही नाही. पंचम किंवा मध्यम तर काही वेळा हात सोडून दूर जातात. साsssरं “सा” पाहतो. पण तो सर्व रागरूपात समयचक्रात, सदैव, सतत असतोच. तो आहे म्हणून तर स्वर निवांत रंगतात, खेळतात आणि या आनंदाच्या घरी परततात… समाधानानं
… तृप्तीनं…
“सा” चा आग्रहंच नाही की मी पाया… मूळ स्वर… आधार… सतत माझा सन्मान करा… पण तो अटळ… आहेच… असणारच आहे…. सजणाऱ्या सर्व रंगांबरोबर… रसांबरोबर…
श्रुतींबरोबर…. “सा” सगळं जाणतो.. अगदी सहज स्वतःचा पोतही बदलतो… कधी स्पष्ट कधी लख्ख कधी अंधुक होतो. पण प्रत्येक “कहन ” चा तो “पूर्णविराम” असतो. शांत, तृप्त… त्याला माहिती आहे स्वर कितीही सप्तकात हिंडले, कितीही लयीत खेळले तरी अखेर “सा ” च्या तेजाशीच एकरूप होणार.. मिसळून जाणार… समर्पित होणार… तेच तर त्यांचं मूळ, कूळ, गोत्र…. आणि तिथे ते छान एकरूप झाले तरंच हे पक्कं होईल की ते काही तरी चांगलं, अचूक, सुरेल, रंगवून, सजवून आलेत. स्वर, लय, शब्द सारी अंग… घराणं, राग, ताल कोणतंही असो…. लोकगीत, भावगीत, दादरा, ठुमरी, नाट्य, चित्रपट कोणती का गायकी असेना हा सर्वत्र……
अचल!! अटल!! ठाम!!
तो भारदस्त, अचूक, स्थिर, गोल, गोड, भावपूर्ण असा लागला तरंच रंग भरणार…. आनंदाचं घर रस भावानी लयदार सजणार. बेहेलावे, मुरकी, खटका, मींडची तोरणं डोलणार…. राग, स्वर, शब्दांच्या रंगभऱ्या रांगोळ्या सजणार…… अशा सुंदर गायकीचा पत्ता सांगू?…..
आनंदाचं घर🏡
कुटुंब प्रमुख “सा”🎼
कुटुंबातले सदस्य “१२”🎼
आणि महत्वाची सहज सापडणारी खूण म्हणजे.. सभोवती अगणित स्वर, भाव, रंग गंधांची फुललेली फुलबाग…
संत तुकारामांचा हा अभंग. आपले मरण आपणच पाहणे आणि मरण हा अनुपम्य सोहळा होणे, सामान्य माणसाच्या दृष्टीने हे सगळेच अतर्क्य, अद्भुत, विचित्र. त्यामुळे हा एक वेगळाच विचार करायला लावणारा अभंग. कारण मरण ही कल्पनाच सामान्य माणसाला भीतीदायक, दु:खद वाटते. लौकिक जगातील सुखोपभोगाना चटावलेला माणूस मरण ही कल्पना सहन करू शकत नाही. पण येथे मरण आहे ते पंचभूतीक देहाचे नव्हे तर देहबुद्धीचे आहे. अहंकाराचे आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या मी माझेपणाचे आहे. मी माझे पणामुळे दोरीला बांधलेल्या माकडासारखे माणसाची स्थिती होते. तो आपल्या संकुचित विश्वाचा मी शहाणा, मी विद्वान, माझे घर, माझे मुले, एवढाच विचार करतो. पण यांतून बाहेर पडणारा जगाचा विचार करतो. मी देह हा मर्यादित विचार जाऊन हे विश्वाच माझे आहे. मी आत्मा आहे. हा भाव निर्माण होतो. म्हणजे देह असून विदेही अशी ही अवस्था, तुकाराम येथे मृत्यूच्या रूपकाने वर्णन करतात.
खरे पाहता तुकाराम सर्वसामान्य माणसांसारखे प्रापंचिक, व्यावसायिक व सुखवस्तू होते. विठ्ठल भक्ती परंपरागत होती. पण घरातील व बाहेरील प्रतिकूल प्रसंगाने त्यांचे चित्त उद्विग्न झाले. संसार तापाने तापलेले मन ईश्वरचिंतनात रमू लागले. गुरुउपदेश आणि ईश्वरचिंतन यामुळे ‘नित्य नवा जागृतीचा दिवस’ अनुभव लागले. देहबुद्धी कमी झाली. मी माझे पणाची जागा ईश्वराने घेतली. दुष्काळ संपला. सुकाळ आला. माया, मत्सर, काम, क्रोध हे देहाची निगडीत विकार, सुखदुःख इत्यादी द्वंद्वे आणि नाम, रूप, कुळ या सर्व उपाधी लोप पावल्या. त्यांची राख झाली. म्हणजे एका दृष्टीने सर्व देहभावाचे मरणच. शरीर आहे पण विकार नाही. असा हा मुक्तीचा सोहळा तुकारामांनी आपल्या डोळ्यांनी जिवंतपणेच पाहिला. त्यांना परमेश्वराच्या ठिकाणी स्थान मिळाले. त्याचाच ध्यास राहिला. ते भगवंतमय झाले. सर्वत्र तोच हा अनुभव आणि मी तोच, मग जन्म मरण कोठून आणि त्याच्याशी निगडित सोयर सुतक व इतर विधीही नाहीत. असा हा अनुपम सोहळा. सच्चिदानंदाची ऐक्य, अखंड आनंद. त्रैलोक्य त्या आत्मानंदाने भरून गेले. ‘ आनंदाचे डोही, आनंद तरंग’ अशी ही अवस्था. अणु रेणु एवढा तुका आकाशाप्रमाणे व्यापक झाला. संकुचित देह बुद्धीतून विश्वव्यापक झाला. हे विश्वचि माझे घर आणि मग त्याच्यासाठीच कार्य, तोच ध्यास. अशा प्रकारे झालेल्या या पुनर्जन्माचे वर्णन ‘मीच मज व्यालो l पोटी आपुलिया आलो’ असे तुकाराम करतात. जिवंतपणे झालेले हे मरण’ जिता मरण आलेl आप पर गेलेl मूळ हे छेदिलेl संसाराचेll’ संसाराचे चिंता संपली. चिंता करितो विश्वाची अशी अवस्था प्राप्त झाली. म्हणून हे मरण अनुपम्य झाले. मी ची जाणीव संपली. ‘आता उरलो उपकारापुरता. ‘ स्वतून विरक्त होऊन स्वकियांसाठी कार्य सुरू ठेवणे, हा अनुभव, हा बदल, हे मरण आणि पुन्हा जन्म तुकारामांनी स्वतः अनुभवले आणि लोकांना सांगितले.’
तुका म्हणे दिले उमटून जगी l
घेतले ते अंगी लावूनिया ll
सर्व जगापुढे आदर्श ठेवला. म्हणूनच महात्मा फुले, अण्णासाहेब कर्वे यांचे सारखे समाज सुधारक निर्माण झाले. स्वतःला विसरून जगाचे झाले. जगाचा प्रपंच केला. त्यामुळे त्यांचे कार्यही मीच्या मरणातून, स्वर्गाची- आनंदाची निर्मिती या स्वरूपाचे झाले. क्रांतिकारकांनी स्वतःच्या घराची, स्वतःची पर्वा कधीच केली नाही. त्याचे मरण पत्करून भारत मातेला मुक्त करण्याचा प्रयत्न केला. तो तुकारामांसारख्या संतांच्या पावलावर पाऊल ठेवून. ‘बुडते हे जन देखे डोळा’ यासाठीच हा सगळा अट्टाहास. प्रत्येकाची पद्धत वेगळी. कुणी अभंग ही शस्त्रे आणि बाण केले. तर कुणी (सावरकर, सुभाषचंद्र बोस) खऱ्या शस्त्रांची प्रेरणा दिली. गांधींनी सत्याग्रहाचा तर टिळकांनी लेखणी व वाणीचा मार्ग अनुसरला. पण त्यासाठी आधी देह भावाचे मरण सगळ्यांनीच अनुभवले. अशा प्रकारे संत तुकारामांनी जन्म आणि मरण यांना वेगळा अर्थ दिला, जगद्गुरु झाले.
पहिल्या प्रकारचे वाचक हे एखादा विचार वाचला की तात्काळ व्यक्त होणारे म्हणजेच प्रतिक्रिया देणारे असतात.
दुसऱ्या प्रकारचे वाचक एखादा विचार वाचल्यावर त्यावर चिंतन मनन करून त्या विचाराला योग्य शब्दात प्रतिसाद देणारे असतात.
आणि तिसऱ्या प्रकारची माणसे विचार वाचल्यावर कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाहीत. पण स्वतः मात्र त्या विचारावर विचार करत असतातच. अशा वाचकांना ‘सायलेंट रीडर्स’ असे म्हणतात. कुठल्याही ग्रुपमध्ये अशा सायलेंट रीडर्सची संख्या मोठ्या प्रमाणात असते.
तेव्हा आपण जे काही विचार मांडतो त्या विचारावर इतरांची व्यक्त व्हायलाच पाहिजे अशी अपेक्षा करणेच मुळात चूक आहे. त्यासाठी तो माणूस विवेकी नाही, त्याला बोलायची भीती वाटते, अशा पद्धतीचे आपले मत मांडणे हेच तर खरे अविवेकीपणाचे लक्षण म्हटले पाहिजे.
आपण जे विचार मांडतो ते दोन गोष्टींसाठी… एक तर आपल्याला आपले मन मोकळे करायचे असते म्हणून आणि दुसरं म्हणजे तो विचार मांडून इतरांकडून आपल्याला काही नवीन ज्ञान मिळवायचे असते म्हणून.
मग अशा वेळेला आपल्या विचारावर कोण किती प्रतिसाद देतोय हा मुद्दा अत्यंत गौण आहे. आपण आपले विचार मांडत राहावे, वाचणारे वाचत राहतील, प्रतिसाद देणारे प्रतिसाद देत राहतील, प्रतिक्रिया देणारे प्रतिक्रिया देतील आणि सायलेंट रीडर्स तो विचार वाचून त्यांना पटला असेल तर स्वतःमध्ये मुरवण्याचा प्रयत्न करत रहातील अन्यथा वाचून सोडून देतील. या पलीकडे आपला विचार मांडल्यानंतर त्यावर कोणी कसे व्यक्त व्हावे यावर आपला कुठलाही हक्क राहत नाही. म्हणून आपण कुठलीही अपेक्षा न ठेवता कोणालाही दोष न देता शांतपणे आपले विचार मांडत राहावे हेच खरे.
☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – संत मुक्ताबाई… भाग – १ ☆ सौ शालिनी जोशी ☆
चौदाशे वर्षाच्या चांगदेवाना या बारा तेरा वर्षाच्या मुलीने ‘चांगदेव पासष्टीचा’ अर्थ उलगडून सांगितला. ‘चांगा कोरा तो कोराच’ अशा शब्दात चांगदेवांची थट्टा करणारी मुक्ताई चांगदेवांची गुरु झाली. यांनी तिचे शिष्यत्व पत्करून तिचा गौरवच केला. नामदेव तिच्याविषयी म्हणतात, ‘लहानगी मुक्ताबाई जशी सणकाडी। केले देशोधडी महान संत।’ते योग्यच आहे. हटयोगी, वयोवृद्ध, ज्ञाननिष्ठ चांगदेवांना ज्ञान देणारी मुक्ताई खरोखरच जगावेगळी. चांगदेवानी तिला आपली आई मानलं. बौद्धिक, ज्ञानमय, मनोमय मातृत्व मुक्ताबाईंनी चांगदेवाना दिले. चांगदेवाना उद्देशून रचलेल्या पाळण्यात त्या म्हणतात,
समाजाभिमुख व अर्थपूर्ण असे ४० अभंग मुक्ताबाईंनी लिहिले. त्यातील एक प्रसिद्ध अभंग,
मुंगी उडाली आकाशी, तिने गेलेले सूर्यासी।
थोर नवलावर झाला, वांझे पुत्र प्रसवला।
विंचू पाताळासी जाय, शेष वंदी त्याचे पाय।
माशी व्याली घार झाली, तेणे मुक्ताई हासली।
समाजातील तीन प्रवृत्तीच्या लोकांचे वर्णन करणारा हा अभंग. विद्वांनानाही विचार करायला लावणारी अशी ही गुढ रचना, लहान वयात मुक्ताबाईंनी केली. यातील पहिली ओळ त्यांचेच वर्णन वाटते.
संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेतल्यानंतर सासवडला सोपानदेवानी समाधी घेतली. नंतर निवृत्तीनाथ मुक्ताबाईंना घेऊन तिर्थ- यात्रा करत निघाले. १२ मे १२९७ रोजी तापी नदीच्या तीरावर अचानक वीज कडाडली. आदिमाता लुप्त झाली. मेहुण येथे त्यांची समाधी आहे. ब्रम्हा, विष्णू, महेश यांचे रूप असणाऱ्या भावांची ही बहीण आदिमाया मुक्ताई. तिच्या समाधी प्रसंगाचे वर्णन नामदेवाने केले,
वीज कडाडली निरंजनी जेव्हा। मुक्ताई तेव्हा गुप्त झाली।
अशाप्रकारे अभिमान, अस्मिता, परखडपणा यांचे बरोबर मार्दव व हळूवारपणा यांचे रूप म्हणजे मुक्ताई. जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद तालुक्याला मुक्ताईनगर नाव दिले आहे.
स्त्री-पुरुष भेदाच्या पलीकडे गेलेली, तीन आत्मज्ञानी भावांची बहीण असुनही वेगळे व्यक्तिमत्व असणारी मुक्ताबाई अमर झाली. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील पहिली संत कवियत्री ठरली. नामस्मरणाने विदेही होण्याचा मार्ग त्यांनी स्त्रियांना तसेच सर्व लोकांना दाखवला. सदेह मुक्तीचा अनुभव त्यांनी घेतला होता. स्त्री पुरुष समानतेची त्या प्रचारक ठरतात.