मराठी साहित्य – विविधा ☆ ही दरी कमी करूया !! ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

ही दरी कमी करूया !! ☆ श्री सुनील देशपांडे 

माणसाचं मन किती विचित्र असतं !  मृत्यू अटळ आहे हे समजायला लागल्यापासूनच माणसाला अमरत्वाची सुद्धा  स्वप्नं पडू लागली. अमरत्त्व ही अशक्य गोष्ट आहे हे माहीत असूनही मानव अमरत्वाच्या संकल्पनेकडे सरकण्याचा प्रयत्न करतोच आहे. अगदी हजारो वर्षापासून !  या प्रयत्नाचा एक महत्वाचा टप्पा मानवानं या शतकात मात्र गाठला आहे असे म्हणायला हरकत नाही. तो म्हणजे अवयव प्रत्यारोपण.

१९०५ साली तो म्हणाला ‘ मी मेलो तरी माझे नेत्र दुसऱ्याच्या शरीरात जिवंत राहतील‘

१९५४ साली तो म्हणाला ‘ मी मेलो तरी माझी मूत्रपिंडे  दुसऱ्याच्या शरीरात जिवंत राहतील ‘

असं करता करता तो आज  म्हणू शकतोय कि ‘ मी मरेन पण माझे हृदय, फुफ्फुसे, हाडं, कुर्च्या, मगज, यकृत, स्वादुपिंड, आतडी, प्लिहा हे सर्व अवयव कुणाच्या ना कुणाच्या शरीरात जिवंत राहू शकतील, मी मरेन पण अवयव रूपी उरेन !’

मानवाचा अमरत्वाच्या वाटेवरून  चाललेला हा प्रवास, वैद्यकशास्त्राच्या संशोधनातूनच या टप्प्यावर पोहोचला आहे. अवयव प्रत्यारोपणाच्या जेवढ्या जास्तीत जास्त शस्त्रक्रिया होतील तेवढे हे संशोधन पुढे पुढे जाईल. तसेच वरील अवयवांच्या यादीत अधिकाधिक भर पडत जाईल आणि प्रत्यारोपणाच्या यशस्वितेची टक्केवारी वाढत जाईल हे नक्की.

पण हे सगळं घडण्यासाठी मुख्य गरज आहे ती हा विषय सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची आणि हे शिवधनुष्य पेलण्याची.

२०१५ मध्ये जे जे हॉस्पिटल मध्ये  अवयवदान कार्यकर्त्यांची एक सभा वसईच्या देहमुक्ती मिशनचे प्रमुख श्री पुरुषोत्तम पवार यांच्या प्रयत्नाने आयोजित केली गेली होती. त्यावेळी श्री पवार यांनी असा प्रस्ताव मांडला की आपण सर्वच आपापल्या भागात उत्तम काम करत आहोत. परंतु आपण सगळे एक होऊन जर कामाला लागलो तर खूप मोठ्या प्रमाणावर हे कार्य राज्यभर उभे राहू शकेल.

आणि 

सर्वांच्या संमतीने एका मोठ्या महासंघाची स्थापना करण्याचा संकल्प झाला. त्यानुसार श्री पुरुषोत्तम पवार यांच्या बरोबर  दधिची देहदान समिती, मानव ज्योत, जीवन ज्योत, सुमती ग्रुप अशा प्रस्थापित सेवाभावी संस्थांच्या श्री सुधीर बागाईतकर, श्री विनोद हरिया, श्री. कुलीनकांत लुठीया, श्री. विनायक जोशी या कार्यकर्त्यांनी देखील या महासंघासाठी चंग बांधला.

या सर्वांच्या प्रयत्नातून २०१६ मध्ये महाराष्ट्रातील अवयवदान क्षेत्रातील अनेक सदस्यांशी संपर्क करून एक राज्यव्यापी कार्यकर्त्यांचे अधिवेशन मुंबई मुलुंड येथे, महाराष्ट्र सेवा संघ यांच्या सहकार्याने आयोजित केले. या अधिवेशनात डॉ. वत्सला त्रिवेदी, डॉ. प्रवीण शिनगारे, नागपूरचे चंद्रकांत मेहेर  इत्यादी मान्यवर मार्गदर्शनासाठी उपलब्ध झाले. प्रमुख पाहुणे म्हणून भारतात ज्यांच्यावर २००३ मध्ये पहिले यशस्वी यकृत प्रत्यारोपण झाले होते, असे नाशिक येथील डॉ. भाऊसाहेब मोरे यांना पाचारण करण्यात आले होते.

या अधिवेशनाच्या यशस्वीतेमुळे महाराष्ट्रातील विविध भागातील संस्था व कार्यकर्ते महासंघाशी जोडले गेले. सतत दोन वर्षांच्या यशस्वी कार्यकालानंतर दिनांक १७ मे २०१७ रोजी महासंघाची सरकार दरबारी नोंद होऊन नोंदणीकृत संस्था म्हणून कार्यरत झालेला हा महासंघ म्हणजे दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन.

त्याच दरम्यान नाशिक येथून पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पालथा घालण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेले आणि पहिली नाशिक ते आनंदवन अशी ११०० किलोमीटरची पदयात्रा आयोजित करणारे श्री सुनील देशपांडे यांच्याशी श्री पुरुषोत्तम पवार यांनी संपर्क साधला. श्री देशपांडे यांच्या उपक्रमाला फेडरेशनचा संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. त्या पदयात्रेच्या यशस्वीतेनंतर त्यांना फेडरेशनमध्ये सामील करून घेऊन ही पदयात्रां ची संकल्पना पुढे महासंघामार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर राबवली गेली. चार पदयात्रांच्या माध्यमातून महाराष्ट्रातले जवळपास सर्व जिल्हे पादाक्रांत केले गेले.

महासंघाचे विविध कार्यकर्ते संलग्न संस्थांचे कार्यकर्ते आणि पदयात्रांच्या माध्यमातून हजारो कार्यक्रमांच्या आयोजनातून लाखो लोकांपर्यंत अवयवदानाचा विषय महासंघाने नेऊन पोहोचवला.

आज १७ मे २०२४ रोजी या संस्थेला सात वर्षे पूर्ण होत आहेत.

(अर्थात संस्थेचे कार्य नोंदणीपूर्वीच चालू झाले होते त्या दृष्टीने नऊ वर्षे म्हणता येतील. परंतु कोरोनाची दोन वर्षे सोडून देऊ. )  परंतु या सात वर्षात संस्थेने खूप मोठा पल्ला गाठला आहे.

वैद्यकीय संशोधनातून माणसाला मृत्यूच्या पाशातून सोडवण्यासाठी संशोधक झटत असले तरी त्याचा उपयोग व उपभोग माणसाला घेता यावा यासाठी समाज प्रबोधन व जनजागृतीची फार मोठ्या प्रमाणावर गरज असते. सामाजिक संस्था, रुग्णालये व प्रसिद्धी माध्यमांनाच यासाठी झटले पाहिजे.

ही गोष्ट वेळीच जाणून घेऊन दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन

ही संस्था या जनप्रबोधनाच्या कामामध्ये  कार्यरत होऊन राज्यभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आठ  वर्षे समाज प्रबोधन करत आहे.

प्रसिद्धी हे समाज प्रबोधनाचे अविभाज्य अंग आहे. यासाठी विविध प्रसिद्धी माध्यमांच्या सहकार्याचीही फेडरेशन ला गरज आहे. अनेक प्रसिद्धी माध्यमांनी हे सहकार्य दिले सुद्धा आहे.

महाराष्ट्र राज्या मध्ये अवयवदानाला समर्पित  आणि  अवयवदानाच्या समाज जागृती व प्रबोधन कार्याची मुहूर्तमेढ रोवणारी राज्यस्तरीय संस्था म्हणून दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबई. ही संस्था आज प्रामुख्याने  ओळखली जाते. महाराष्ट्र राज्यभर पसरलेल्या आपल्या विविध जिल्हा शाखांमार्फत ही संस्था कार्यरत आहे. अलीकडच्या काळात केंद्र व राज्य सरकारांनी सुद्धा या विषयात विशेष लक्ष घालण्याचे ठरवले असून तशा सूचना संबंधित कार्यालयांना दिल्या गेल्या आहेत. तरीही राज्यभर फेडरेशन मार्फत  या सर्व सरकारी संस्थांच्या समन्वयातून चालू असलेल्या कार्याला तोड नाही हे कबूल करावेच लागेल.

अनेक वर्षांपूर्वी तामिळनाडू सरकारमध्ये ना. सुश्री (कै) जयललिताजी मुख्यमंत्री असताना या चळवळीला तेथे सरकारी पाठबळ मिळालं आणि या  चळवळीने  तामिळनाडू राज्यात चांगलेच मूळ धरले.

भारत सरकारने सन १९९४ मध्ये अवयवदानाचा कायदा संमत केला. त्या नंतर आजपर्यंत सरकारी पातळीवर काही यंत्रणाही  निर्माण करण्यात आल्या आहेत.

अशा सर्व सरकारी यंत्रणांच्या समन्वयाने आणि त्यांना पूरक म्हणून दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन ही राज्यस्तरीय  संस्था आता राज्याबाहेर सुद्धा भरारी घेण्याच्या तयारीत आहेच, परंतु सध्या संपूर्ण भारत देशामध्ये विविध संस्थांच्या संपर्कात राहून फेडरेशन कार्याच्या कक्षा रुंदावत आहे.

कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून या कार्यासाठी अधिकधिक  प्रशिक्षित कार्यकर्ते निर्माण व्हावेत म्हणून फेडरेशन सध्या भारतभर प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी संपर्क साधून आहे. स्वतःच्या अनुभवांच्या फायद्याची देवाण-घेवाण  इतर संस्थांशी आणि कार्यकर्त्यांशी करण्यासाठी कार्यकर्ता प्रशिक्षणाचे एक प्रारूप संस्थेने बनवले आहे. तीनस्तरीय महादान (नेत्रदान, त्वचादान, देहदान, अवयवदान इत्यादी सर्व शारीरिक दाने)  प्रशिक्षणक्रमाचे हे प्रारूप संस्था राबवित आहे.

‌असे असले तरी जनजागृतीच्या बाबतीत आपण सगळेच अजून खूपच मागे आहोत हे पुढील आकडेवारीवरून लक्षात येईल. देशात प्रत्यारोपणासाठी दरवर्षी सर्वसाधारणपणे दोन लक्ष मूत्रपिंडांची  गरज असते त्यापैकी सध्या ६००० पेक्षा जास्त मूत्रपिंडे उपलब्ध होऊ शकत नाहीत. ३०००० पेक्षा जास्त यकृतांची गरज आहे पण फक्त १५०० च्या जवळपास यकृतेच उपलब्ध होऊ शकतात. साधारण ५०००० हृदयांची गरज आहे पण फक्त १०० च्या जवळपास हृदयेच उपलब्ध होऊ शकतात. १ लक्ष डोळ्यांच्या गरजे पैकी २५००० पेक्षा जास्त नेत्र उपलब्ध होऊ शकत नाहीत. सध्याची परिस्थिती पहाता व दिवसेंदिवस अवयवांच्या गरजेची वाढती संख्या पहाता दर वर्षी आवश्यकता व उपलब्धता या मधील दरी वाढतच आहे. ही वाढती दरी भरून काढायची असेल तर अवयवदानाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले पाहिजे. या सर्व परिस्थितीवर एकच उपाय म्हणजे जनजागृती !  आता ही जबाबदारी प्रामुख्याने सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था व प्रसिद्धी माध्यमांवरच येऊन पडते. म्हणूनच  दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या संस्थेचे समन्वयाने प्रबोधन करण्याचे कार्य  आज सर्वांच्या डोळ्यात भरते आहे.

फेडरेशनला आज अनेकांच्या सक्रिय सहकार्याची आणि बरोबरीने वाटचाल करण्याची गरज आहे.

जनजागृती कार्यक्रमांना प्रसिद्धी माध्यमांकडून अधिक सहकार्य मिळावे. या  संबंधीच्या मजकुराला प्रसिद्धी माध्यमांमध्ये सुद्धा महत्वाचे स्थान मिळावे असे  वाटते. पण त्याच बरोबर प्रसिद्धी माध्यमांनी आणि विविध कंपन्या आणि व्यापारी संस्था यांनी सुद्धा स्वतःहून कांही उपक्रमांचे आयोजन करणे ही आज काळाची गरज आहे.

असे काही आयोजन कोणी करणार असल्यास फेडरेशन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे. फेडरेशनला सामाजिक दायित्व उपक्रम ( सी. एस. आर. ) यासाठी मंजूरी असून ज्या कंपन्यांकडे सीएसआर साठी निधी उपलब्ध असेल त्यांचे बरोबर समन्वय करून चांगले प्रकल्प राबवण्यासाठी फेडरेशन कटिबद्ध आहे.

फेडरेशन ला मिळणाऱ्या देणग्यांसाठी ८०जी कलमाखाली आयकराची सवलत प्राप्त आहे.

विविध खाजगी व सरकारी यंत्रणा, रुग्णालये, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था व प्रसिध्दी माध्यमे यांनी एकमेकांना सहकार्य करून विविध उपक्रमांनी अवयवदानासाठी   लोक जागरणाची व्यापक मोहीम आखणे जरूर आहे. पण त्या नंतर सुद्धा सतत वरचेवर हा विषय व या विषयावरील चर्चा जागती ठेवली पाहिजे. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, भित्तीपत्रके (पोस्टर) स्पर्धा, पदयात्रा, सायकल रॅली, मोटारसायकल रॅली. चित्ररथ, घोषणा व फलकबाजी, पत्रके वाटप, पथनाट्ये, या विषयावरील कविता-गाणी, नाट्यछटा, एकांकिका, लेख, व्याख्याने वगैरे जे जे करता येईल त्या सर्व मार्गानी लोकांच्या पर्यंत या विषयाचे महत्व पोहोचवण्याची धडपड आज फेडरेशन करत आहे. हा विषय लोकांच्या डोक्यातून, कानातून मनात पोहोचला पाहिजे आणि मनामनात रुजला पाहिजे.

त्याही पुढे जाऊन मी म्हणतो, चांगले काम करायला औचित्य हवेच का ?   हवेच असेल तर

१७ मे हा महासंघाचा म्हणजेच फेडरेशनचा वर्धापन दिन आहे, हे औचित्य काय कमी आहे ?  

चला आपण जे कोणी सुजाण नागरिक आहोत, विचारवंत, समाज सुधारक जे कोणी आहोत त्या सर्वानी नक्की ठरवूया  की काळाचे हे आव्हान पेलण्यासाठी  आपण अवयवांची उपलब्धता व गरज या मधील दरी  कमी करण्या साठी झटून प्रयत्न करूया ! 

त्यासाठी आपण फेडरेशनशी संपर्क साधावा.

फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲंड बॉडी डोनेशन

६०१, कैलाशधाम , जी. व्ही. स्कीम रोड नंबर ४ मुलुंड, मुंबई  ४०००८१

ई-मेल : [email protected] [email protected]

www. organdonation.net.in

पत्रव्यवहारासाठी पत्ता:

श्रीकांत कुलकर्णी (सचिव) 

३, श्रीनिवास गौरव अपार्टमेंट, ऑफ मयूर कॉलनी डीपी रोड, कोथरूड, पुणे ४११०३८

© श्री सुनील देशपांडे

(उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन.) 

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – बाबांना मिळणाऱ्या अगम्य अशा भविष्यसूचक संकेतांच्या वाचासिध्दीसदृश इतर सकारात्मक प्रचितींच्या तुलनेतला हा काळजाचा ठोका चुकवणारा एक अपवादात्मक अनुभव मनात बाबांच्या आठवणींना चिकटून बसलाय!)

दत्तमहाराजांवरील बाबांची श्रद्धा उत्कट होती हे खरं पण रोजची पूजाअर्चा, जपजाप्य यासाठी फारसा वेळ ते देऊच शकायचे नाहीत.हे त्यांनी जरी मनोमन स्विकारलेलं असलं तरी गुरुचरित्राचं पारायण करायचं त्यांच्या बरेच दिवस मनात असूनही ते शक्य झालं नव्हतं. याचं मुख्य कारण म्हणजे घरी ती पोथी नव्हती, कुणाकडून तरी मागून घेऊन ती वाचणं बाबांना रुचणं शक्य नव्हतं आणि स्वतः पोथी विकत घेण्याइतकी सवड आर्थिक ओढग्रस्तीत त्यांना मिळालेली नव्हती.या गोष्टीची रुखरुख मात्र बरेच दिवस त्यांच्या मनात होतीच.ती अधिक तीव्र झाली त्याला निमित्त ठरलं वर्तमानपत्रात आलेल्या ‘ढवळे प्रकाशन, पुणे’ या प्रसिद्ध प्रकाशनसंस्थेच्या एका जाहिरातीचं! ती जाहिरात अनेक दिवस रोज ठळकपणे प्रसिद्ध होऊ लागली. गुरुचरित्राची कापडी आणि रेशमी बांधणी अशा दोन प्रकारची नवी आवृत्ती प्रकाशित होणार असल्याची ती जाहिरात होती.त्यासाठी प्रकाशनपूर्व सवलतही जाहीर झालेली होती. शिवाय दहा प्रतींची ऑर्डर देणाऱ्यास एक प्रत मोफत मिळणार होती.ही सवलत अर्थातच पुस्तक विक्रेत्यांसाठी असल्याचे गृहित धरुन बाबांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं. एरवीही रेशमी बांधणीपेक्षा कापडी बांधणीच्या प्रतीची किंमत कमी असूनही ती प्रत विकत घेणंही बाबांच्या आटोक्यात नव्हतंच.या पार्श्वभूमीवर अचानक एक दिवस गुरुचरित्राच्या रेशमी बांधणीची एकेक प्रत विकत घेणारे अनेक इच्छुक बाबांना येऊन भेटले व त्यांनी बाबांना सहकार्य करण्याची विनंती केली. ‘आमच्या प्रत्येकी एकेक अशा प्रतींची एकत्रित नोंदणी करणे, त्या व्हीपीने येतील तेव्हा ती व्हीपी सोडवून घेणे हे व्याप दहाजणांनी आपापले करण्यापेक्षा आम्हा दहा जणांचे पैसे आधीच गोळा करून ते आम्ही तुमच्याकडे देऊ.तुम्ही एकत्रित दहा प्रतींची ऑर्डर बुक करा म्हणजे आमचे काम खूप सोपे होईल.त्या बदल्यात दहा प्रतींवर मिळणारी रेशमी बांधणीची एक मोफत प्रत तुम्ही तुमच्यासाठी ठेवून घ्या’ असा त्यांचा प्रस्ताव होता. यात नाकारण्यासारखं काही नव्हतंच. बाबांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि घरबसल्या त्या सर्वांचं काम तर झालंच आणि कांहीही पैसे खर्च न करता गुरुचरित्राची एक प्रत आणि तीही रेशमी बांधणीची बाबांना घरपोच मिळाली. त्याक्षणीचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी कधीच विसरणार नाही.मी माझ्या त्या बालवयात अंत:प्रेरणेनेच त्या पोथीतला रोज एक अध्याय वाचायला सुरुवात केली होती.ते माझं दत्तसेवेच्या वाटेवरचं पहिलं पाऊल होतं! पुढे कालांतराने आम्ही सर्व भावंडे स्थिरस्थावर झाल्यावर नोकरीनिमित्ताने वेगवेगळ्या दिशांना विखुरले गेलो तरी पुढे अनेक वर्षे ती गुरुचरित्राची पोथी माझ्या देवघरात मी बाबांकडून मिळालेला प्रसाद या भावनेनेच जपली होती.ती पोथी हाताळताही न येण्याइतकी जीर्ण होईपर्यंतच्या प्रदीर्घकाळांत गुरुचरित्राचे नित्य वाचन, पारायण हे सगळं माझ्या आनंदाचाच एक भाग होत वर्षानुवर्षे माझ्या अंगवळणीच पडून गेलं होतं!

माझ्या हातून यथाशक्ती सुरू असणाऱ्या दत्तसेवेचं समाधान आणि आम्हा भावंडांच्या पाठी असणारी आई बाबांची पुण्याई माझ्यादृष्टीने अतिशय मोलाची होती हे खरे, पण म्हणून त्यामुळे माझ्या पुढील जीवनवाटेवर खाचखळगे आलेच

नाहीत असं नाही.किंबहुना मिळेल त्या दिशांचा परस्पर वेगळ्या वाटांवरचा आम्हा सर्वच भावंडांचा प्रवास क्षणोक्षणी आमची कसोटी पहाणाराच होता.

माझ्या आयुष्यातल्या अशा अस्थिर प्रवासाला सुरुवात झाली तो क्षण मी कधीच विसरू शकणार नाही. त्या नेमक्या क्षणी स्वतः पूर्णतः परावलंबी होऊन अंथरुण धरलेल्या माझ्या बाबांनी त्यांच्या अंत:प्रेरणेने मला दिलेली अमूल्य भेट मी आजही जपून ठेवलेली आहे. तो सगळाच प्रसंग आत्ता या क्षणी पुन्हा घडत असल्यासारखा मला स्पष्ट दिसतो आहे!

अर्थात या आधी सांगितलेल्या कांही मोजक्या आठवणींच्या तुलनेत खूप वर्षांनंतरची ही गोष्ट आहे.बाबा निवृत्त होईपर्यंत माझ्या दोन्ही बहिणींची लग्ने झालेली होती. आई, बाबा न् आम्ही दोन भाऊ किर्लोस्करवाडी सोडून माझं कॉलेजशिक्षण सोयीचं व्हावं म्हणून मिरजेत रहायला आलो होतो. लहान मोठी नोकरी करत राहिलेल्या माझ्या मोठ्या भावाला माझं काॅलेज शिक्षण संपण्याच्या दरम्यान नुकताच स्टेट बँकेत जॉब मिळून त्याचं पोस्टिंग इस्लामपूरला झालं होतं. आम्ही सर्वजण मग मिरज सोडून तिकडे शिफ्ट झालो.

तिथे गेल्यानंतर काही दिवसातच बाबांनी अंथरूण धरलं ते अखेरपर्यंत त्यातून उठलेच नाहीत. त्याच दरम्यान मला मुंबईत एक जेमतेम पगाराची खाजगी नोकरी मिळायची संधी आली, तेव्हा ती स्वीकारून चांगल्या नोकरीच्या शोधात रहायचं असं ठरलं आणि मी माझी बॅग भरू लागलो. माझं वय तेव्हा जेमतेम १८/१९ वर्षांचं. तोवर घर सोडून मी कुठे बाहेर गेलेलो नव्हतो. मुंबई तर पूर्वी कधी पाहिलीही नव्हती. त्यामुळे जायचं ठरलं त्या क्षणापासून मनावर एक विचित्र असं दडपण होतं आणि अनामिक अशी भीतीही. निघायच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना देवघरातल्या पादुकांवर मी फुलं वाहू लागलो आणि माझे डोळे भरून आले. गुरुचरित्राच्या पोथीलाही मी फुलं वाहून नमस्कार केला तेव्हा ‘माझं तिथं सगऴं व्यवस्थित मार्गी लागू दे’ हा विचार मनात नव्हताच. वर्षानुवर्षे सुरु असलेल्या पादुकांच्या नित्यपूजेत मात्र आता प्रदीर्घ काळ खंड पडणार आणि गुरुचरित्र नित्यवाचनही जमणार नाही या कल्पनेनेच मी अस्वस्थ झालो होतो. ‘मला अंतर देऊ नका..’ अशी कळवळून मी केलेली प्रार्थना आजही मला आठवतेय.आश्चर्य म्हणजे माझ्या मनातली ती कळकळ दत्तगुरुपर्यंत पोचल्याची प्रचिती मला घर सोडण्यापूर्वीच मिळाली आणि तीही अंथरुणावर निपचित पडून असलेल्या बाबांच्यामार्फत! हे सगळं माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं तर होतंच पण आजही तितकंच अनाकलनीय!

निघताना मी बाबांचा निरोप घ्यायला गेलो, तेव्हा बाबा थोडे अस्वस्थ झाल्याचं मला जाणवलं.

“जपून जा.” अंथरुणावर पडल्यापडल्याच ते म्हणाले. मी नमस्कारासाठी वाकणार तेवढ्यात आपला थरथरता हात कसाबसा वर करीत त्यांनी माझा आधार घेतला आणि ते महत्प्रयासाने उठून बसले. मी त्यांना वाकून नमस्कार केला.

” तुला काय देऊ?” त्यांनी विचारलं

खरंतर पूर्णतः निष्कांचन असणाऱ्या त्यांनी मला उचलून काही द्यावं अशी माझी अपेक्षा नव्हतीच आणि तसं कांही देण्यासारखं त्यांचं स्वतःचं असं लौकीकार्थानं त्यांच्याजवळ काही नव्हतंही. पण अलौकिक असं खूप मोलाचं कांही देण्याचा ते विचार करत असतील असं माझ्या मनातही आलं नव्हतं.उलट ‘तुला काय देऊ?’ या त्यांच्या प्रश्नात मला काय हवंय यापेक्षा आपण याला काही देऊ शकत नाहीय हीच खंत त्यांच्या मनात होती असंच मला वाटून गेलं. त्यांना बरं वाटावं म्हणून तत्परतेने मी म्हणालो,

“बाबा, खरंच कांही नको. आशीर्वाद द्या फक्त”

ते स्वतःशीच हसले. त्या स्मितहास्यात एक गूढ अशी लहर तरंगत असल्याचा मला भास झाला. त्यांनी मला स्वतःजवळ बसवून घेतलं. थोपटलं. आपला थरथरता हात अलगद माझ्या डोक्यावर ठेवून म्हणाले,

“बाळा, आशीर्वाद तर आहेतच रे. आणि ते नेहमीच रहातील. एवढ्या मोठ्या कामासाठी जातो आहेस, मग कांहीतरी द्यायला हवंच ना रे?..” बोलता बोलता त्यांनी त्यांच्या गादीचा कोपरा अलगद वर दुमडला.तिथली त्यांची डायरी उचलली.त्या डायरीत निगुतीने जपून ठेवलेला एक फोटो अलगद बाहेर काढला आणि तो माझ्यापुढे धरला..

“घे.हा फोटो हेच माझे आशीर्वाद आहेत असं समज. नीट जपून ठेव.रोज याचे नित्य दर्शन घेत जा.तीच तुझी नित्य सेवा .तोच नित्यनेम.सेवेत अंतर पडेल ही मनातली भावना काढून टाक.या फोटोच्या रुपात महाराज तुझी सोबत करतील. सगळं सुरळीत होईल.काळजी नको.”

मी भारावलेल्या अवस्थेत त्यांचा शब्द न् शब्द मनात कोरुन ठेवत होतो. ते बोलायचे थांबले तसा मी भानावर आलो.कृतज्ञतेनं बाबाकडे पाहिलं. सकाळी पूजा झाल्यानंतर मी पादुकांसमोर, पोथीसमोर डोकं टेकवलं तेव्हाची माझ्या मनातली कातरता मला आठवली आणि आताची बाबांच्या नजरेतली चमक आणि त्यांच्या शब्दात भरून राहिलेला, मला स्वस्थ करणारा गाभाऱ्यातूनच उमटल्यासारखा त्यांचा अलौकिक स्वर …मी अक्षरशः अंतर्बाह्य शहारलो. त्याच मनोवस्थेत त्यांच्या हातातला तो फोटो घेतला आणि त्यांना नमस्कार केला.

तो एक अतिशय छोट्या आकाराचा दत्ताचा फोटो होता! छोटा आकार म्हणजे किती तर आपल्या बोटाच्या दोन पेरांएवढ्या उंचीचा न् फार तर एका पेराएवढ्या रुंदीचा. पिवळ्या धमक रंगाचं जरीकाठी सोवळं नेसलेलं, हसतमुख प्रसन्न मुद्रा असलेलं ते दत्तरूप होतं!

या दत्तरूपानं मला पुढं खूप कांही दिलंय. पण प्रकर्षाने कृतज्ञ रहावं असं काही दिलं असेल तर ते म्हणजे बाबांच्या वाचासिद्धीची थक्क करणारी प्रचिती! ती कशी हे सगळंच सांगायचं तर तो एक वेगळाच प्रदीर्घ लेखनाचा विषय होईल. पण माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक अवेळेला, माझी कसोटी पहाणाऱ्या असंख्य प्रसंगांच्या वेळी किंवा अगदी उध्वस्त करू पहाणाऱ्या नैसर्गिक संकटांच्या वेळीही फक्त मलाच जाणवेल असा आधार, दिलासा आणि माझ्या विचारांना योग्य दिशा दिलीय ती या दत्तरूपानेच!

आज इतक्या वर्षांनंतरही तो फोटो मी माझ्याजवळ जपून ठेवलाय! आजही त्याचे नित्य दर्शन मी घेतो तेव्हा ‘तो’ माझ्याजवळ असतोच आणि त्याच दत्तरुपाशी निगडीत असणारी माझ्या बाबांची आठवणसुध्दा!

 क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मालगुडी डेज… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

मालगुडी डेज ☆ सौ कल्याणी केळकर बापट

1985,86 चा काळ खुप भन्नाट काळ कारणं ह्या वर्षात यवतमाळात आमच्या घरी टिव्ही चे आगमन झाले. ह्या टिव्ही ने सगळ्यांना खिळवून ठेवले होते बघा. जरी वडीलधारी मंडळी ह्या टिव्ही ला इडियट बॉक्स म्हणत असले तरीही ते सुद्धा ह्याच्या समोर ठाण मांडून बसत असत. अर्थात त्या वेळेचे कार्यक्रम पण एकत्रितपणे बघायच्या लायकीचे असायचे म्हणा.   

त्यावेळी माझ्या आवडत्या मलिकांपैकी एक मालिका म्हणजे “मालगुडी डेज”.म्हणजेच मालगुडी डेज ही एक भारतीय दूरचित्रवाणी मालिका आहे. ह्या मालिकेचे सगळंच अफलातून होत, त्याचे कथानक, मालिकेचे शिर्षक गीत,त्या त्याचे चित्रणआणि त्यात काम करणारे कलाकार. असं वाटायचं ह्यातील एक जरी डावें पडले असते तरी ही मलिका परिपूर्ण न वाटता कुठेतरी काहीतरी मिसिंग वाटले असते. 

ही मालिका आर.के. नारायण यांच्या मालगुडी डेज नावाच्या इ.स. १९४३ च्या लघुकथा संग्रहावर आधारित आहे. या मालिकेचे दिग्दर्शन कन्नड अभिनेता आणि दिग्दर्शक शंकर नाग यांनी केले होते. कर्नाटक संगीतकार एल. वैद्यनाथन यांनी स्कोअर तयार केला, तर आरके नारायण यांचा धाकटा भाऊ आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण हे रेखाटन कलाकार होते. ही मालिका चित्रपट निर्माते टीएस नरसिंहन यांनी बनवली होती. ही मलिका बघुन कित्येकांना मालगुडी हे गाव, स्थान काल्पनिक आहे ह्यावर विश्वासच बसत नव्हता. भारतीय रेल्वेने मालगुडी डेज मालिकेच्या स्थानाला आदरांजली म्हणून भारतातील शिमोगा, कर्नाटक मधील अरसालू रेल्वे स्थानकाचे नाव बदलून मालगुडी रेल्वे स्थानक ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

ह्या मालिकेतील कथांचे लेखन आर. के. लक्ष्मण.

हे एक भारतीय इंग्रजी साहित्याचे कसदार लेखन करणारे प्रतिभावान लेखक तर होतेच शिवाय अतिशय मानाचे समजण्यात येणारे साहित्य अकादमी पुरस्कार, पद्मभूषण आणि पद्मविभूषण ह्याचे मानकरी होते. आज त्यांचा स्मृतिदिन.

आर. के. नारायण आणि मालगुडी हे दोन्ही शब्द समानार्थी म्हणून वापरता येतील. १९३५ साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी असल्याची कल्पना करून स्वामी ॲन्ड फ्रेन्ड्‌स या नावाची आपली पहिली कथामालिका  लिहिली.  नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात. या गोष्टी वाचतांना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही, इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी आपल्या कथांमधून उभे केले आहे. या गावातीलच एक गोष्ट ‘दि गाईड’ यावर गाईड नावाचा हिंदी चित्रपट निघाला.

आर के नारायण यांचा  स्मृतिदिन १३ मे रोजी  झाला. मालगुडी डेज सारख्या मालिकेच्या आठवणी जाग्या झाल्यात.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “रफू” ☆ सौ. अर्चना देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

? विविधा ?

☆ “रफू” ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

काल  दुपारी मी टॅक्सीने माहीमहून सिटीलाईटला चालले होते. शोभा हॉटेलच्या सिग्नलला माझी टॅक्सी थांबली.. तेव्हा माझे लक्ष साडीच्या दुकानाच्या बाहेर बसलेल्या रफफू वाल्याकडे गेले. तो बऱ्याच कलरचे कापडाचे कापलेले छोटे छोटे तुकडे एकत्र बांधलेल्या गठ्ठ्यातून उलट सुलट करून शोधत होता. तो बहुदा रफू करायला मॅचिंग कापड शोधत असावा. आत्तापर्यंत मी रस्त्यावर रफू करताना पाहिले होते पण का कोणास ठाऊक आज माझ्या डोक्यात एक विचार येऊन गेला की खरंच एखादी साडी ड्रेस पॅन्ट किंवा कोणत्याही चांगल्या कपड्याला हा रफूवाला किती सफाईने  पडलेले छिद्र अशाप्रकारे दुरुस्त करतो की आपल्याला कळत पण नाही की अगोदर इथे फाटले होते आणि आपण ते  वस्त्र वापरू शकतो.

एखाद्या नवीन कपड्याला छोटेसे भोक पडले तर आपला जीव चुटपुटतो, आपल्याला ते वस्त्र वापरतायेणार नाही याचे वाईट वाटते.. रफू वाल्याच्या हातातल्या कलेने आपण ते वस्त्र वापरू शकतो मग मनात विचार आला की कधीकधी आपल्या एवढ्या मौल्यवान आयुष्यात एखादे नाते खराब झाले तर आपण दुखावतो ,कधी कधी ते नाते संपुष्टात येते. एखादा बॅड पॅच आला‌ तर निराश होतो. मग अशावेळी आपण रफूवाला का होत नाही? तेवढाच पॅच रफू करून परत नव्याने जीवनाकडे पहात तो पॅच विसरून जात नाही . अशावेळी रफूवालयाचे‌ तंत्र आपणआत्मसात केले पाहिजे, अशावेळी कोणती सुई कोणत्या रंगाचे धागे मिक्स करून वापरायचे व पॅच भरून काढायचा  व नव्याने सुरुवात करायची हे पाहायला हवे. थोडासा पॅच दिसेल पण परत नव्याने ते वस्त्र वापरू शकतो यासाठी फक्त हवे असते छोट्या छोट्या रंगीत आठवणींचे गाठोडे आणि प्रेमाची सुई. कोणास ठाऊक कोणत्या वेळी कोणते चांगले क्षण दुखावलेले नाते रफू करायला उपयोगी पडेल व आपण आनंदी होऊ.

चला तर मग या नवीन वर्षात छोट्या छोट्या जुन्या चांगल्या आठवणी मनाच्या कप्प्यात जपून ठेवूया आणि वेळ पडेल तेव्हा रफू वाला होऊया.

लेखक – अज्ञात.

प्रस्तुती – सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ देव देव्हा-यात नाही, देव नाही देवालयी… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

?  विविधा ?

☆ देव देव्हा-यात नाही, देव नाही देवालयी… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

सुधीर ना तू ?

अरे तुझ्या नावातच धीर धरणे आहे.

काळजी करु नकोस,

आम्ही सगळे तुझ्यासोबत आहेत.

सर संघ चालकांचे हे प्रेरणादायी शब्द सुधीर फडके यांना अडचणीच्या वेळी उभारी देऊन गेले.

काही दिवसांपूर्वी  जागतिक पुस्तक दिनानिमित्य एका शाळेत माझ्या पुस्तकातील ‘उत्प्रेरक’ या प्रकरणावर बोलताना मी म्हणालो होतो की आयुष्यात अशा काही व्यक्ती / घटना- प्रसंग  / गोष्टी येतात की ते तुमच्यासाठी ‘कॅटॅलिस्ट’ बनतात.

आज ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ सिनेमा पाहिल्यावर माझ्यासाठी हा सिनेमा नक्कीच ‘उत्प्रेरक ‘ ठरेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचा सिनेमा पहायचा राहिला हे शल्य हा सिनेमा पाहून थोडे का होईना कमी झाले.

स्वत: निर्माण केलेल्या वीर सावकर सिनेमाची ४ तिकीटे विकत घेऊन फडके सिनेमा बघायला येतात ही सिनेमाची सुरवात. दूरदर्शन वरील प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमातील मुलाखतीतून बाबूजींचा जीवनपट फ्लॅशबॅक स्वरूपात उलगडू लागतो.

अत्यंत संघर्षमय तारुण्याचा काळ, आत्महत्या करावी इतका टोकाचा विचार पण सुदैवाने संघ स्वयंसेवक म्हणून मिळत जाणारी मदत आणि एका  टप्यावर आयुष्याला मिळालेली कलाटणी. थक्क करणारा बाबूजींचा हा प्रवास

मुंबई – नाशिक- मालेगाव – पंजाब-कोलकत्ता- कोल्हापूर – पुणे या त्यांच्या प्रवासाबरोबर प्रत्येक घटनेला अनुसरून त्यांचीच गाणी,यांची छान गुंफण झाली आहे

हा माझा मार्ग एकला – ते – फिटे अंधाराचे जाळे व्हाया गीत रामायण ऐकता ऐकता ३ तास कसे संपतात कळत नाही

गदिमा – बाबूजींची जुगलबंदी छान रंगलीय

काही टवाळखोर निरीक्षणे

१) दूरदर्शन च्या आवारात बाहेर फिरताना काही क्षण सुनील बर्वें मधे अजीत पवार यांचा भास  झाला. तर सिनेमातील आशा भोसलेंच्या केसांचा रंग जरा पांढरा असता तर अगदी सुप्रिया ताई…😬

२) गीत रामायण रौप्य महोत्सवी कार्यक्रमात पुण्याला अटलजी त्यांच्या भाषणात म्हणतात ‘सुधीर फडके और मेरा पुराना रिश्ता है’😳  ( इथे आमचाच घोळ झाला)

३) अंकित काणे हे आमचे फेसबुक मित्र. त्यांनी आधीच एक पोस्ट टाकून या सिनेमात त्यांनी पु.लं.ची भूमिका केली हे सांगितले होते म्हणून बरं. नाहीतर हे पु.लं आहेत हे कळलेच नसते 😷

४) किशोर कुमार हे विनोदी नट होते पण त्यांचं फारच विनोदी पात्र इथे सादर केले गेले आहे . 😄

बाबूजींनी संगीतबद्ध केलेले आणि त्यांनी म्हणलेले गाणे

‘ दिन है सुहाना आज पहिली तारीख है ‘

तर योगायोगाने आज १ ल्या तारखेलाच

गुरु ग्रह मेषेतून, वृषभ या रसिक राशीत गेला असताना आमच्यासाठी

ग्रह आले जुळुनी, अनुभवली सगळी सुरेल गाणी 🎼

#माझी_टवाळखोरी 📝

#स्वरगंधर्व_सुधीर_फडके

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ श्रमाची ॲलर्जी: एक राष्ट्रीय रोग – लेखिका- सुश्री परिज्ञा पुरी ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?  विविधा ?

☆ श्रमाची ॲलर्जी: एक राष्ट्रीय रोग – लेखिका- सुश्री परिज्ञा पुरी ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे

एक विचार की आजचे वास्तव?

आधुनिक शिक्षणाने औद्योगिक क्रांतीला लागणारे कामगार तयार झाले का? होय. पण त्याच आधुनिक शिक्षणाने पारंपरिक आणि सामाजिक जीवनातील श्रमाची प्रतिष्ठा नष्ट करून टाकली का? दुर्दैवाने त्याचेही उत्तर होकारार्थी आहे.

शेतकऱ्यांना शेती नको, कष्टकऱ्यांना मोलमजुरी नको, विद्यार्थ्यांना अभ्यासाचे कष्ट नकोत आणि स्त्रियांना घरकाम नको, त्यातही स्वतःच्या मुलांना पूर्णकालिक आई होऊन मोठे करण्याचे दिव्य तर नकोच नको. कोणालाही शारीरिक कष्टाची कामेच नकोशी झाली आहेत. सगळ्यांना खुर्चीत बसून आरामात मिळणारा पगार हवा आहे.

श्रमाची एक खासियत आहे. शारीरिक, अंगमेहनतीची कामे क्वचितच कुणाला आवडतात. पण एकदा का श्रमाची सवय शरीराला जडली की शरीरही तिला सोडू इच्छित नाही. श्रमाने तयार होणारे न्यूरल पाथवेज आयुष्यभर साथ देणारे ठरतात. शारीरिक श्रम ही एक थेरपी आहे. मनात दुःखाचा, अपमानाचा, क्रोधाचा आगडोंब जरी उसळला तरी त्याला शांत करण्याची किंवा त्याची तीव्रता कमी करण्याची शक्ती श्रमात आहे.

मला मनस्वी राग आहे त्या सर्व तथाकथित समाजसुधारकांच्या शिकवणुकीचा ज्यांनी पुस्तकी शिक्षणाला महत्त्व देता देता श्रमाने मिळणाऱ्या भाकरीची किंमत शून्य करून टाकली. या जगात अशी कुठलीही अर्थव्यवस्था अस्तित्वात नव्हती आणि येणार नाही जी सगळ्यांना व्हाइट कॉलर जॉब देऊ शकेल. ब्लू कॉलर जॉब हे जगाचे वास्तव आहे आणि ते कधीही कमी महत्त्वाचे नव्हते.

शेतीसाठी मजूर मिळत नाहीत, घरकामाला बायका मिळत नाहीत, चांगले कामसू आणि होतकरू व्हाइट कॉलर स्टाफ मेंबर्ससुद्धा आजकाल मिळत नाहीत, विद्या ही कष्टाने अर्जित करायची गोष्ट आहे हे आजकालच्या परीक्षार्थींच्या गावीच नसल्याने वर्कफोर्समध्ये गाळ माल भरला आहे ज्यांच्या हातात केवळ कागदाचे तुकडे आहेत, ज्ञान नाही. कारण कुठल्याही प्रकारचे कष्ट कोणालाच नको आहेत. घरातील मोठ्या माणसांची सेवा नकोशी झालीय, लहान मुलांना त्यांचे समाधान होईपर्यंत वेळ देणे नकोसे झाले आहे, सुनेला घरकामात मदत करायला सासूला नकोसे झाले आहे आणि बायकोला घरकामात मदत करायला नवऱ्याला नकोसे वाटत आहे. मी चार पुस्तके शिकले आणि बाहेरून कमावून आणते म्हणजे माझा आणि घरकामाचा आणि स्वयंपाकाचा संबंध नाही हे लग्नाआधी डिक्लेअर करण्यात मुली आणि त्यांच्या आईवडिलांना धन्यता वाटू लागली आहे. एकूण काय, आनंदी आनंद आहे सगळा!

हे सगळं डोळ्यासमोर घडतंय तरी आपलं काही चुकतंय अस कोणालाच वाटत नाहीये. सगळे कसे बदललेली परिस्थिती, जीवनशैली, इ. ना दोष देण्यात व्यस्त आहेत. पण ते बदलणारे आपणच आहोत, हे मात्र कोणालाच मान्य नाहीये.

एकीकडे श्रमाची प्रतिष्ठा नष्ट करणे आणि दुसरीकडे माणसातील मीपणा वाढीस लावणे, ह्या आधुनिक शिक्षणाने निर्माण केलेल्या अशा समस्या आहेत की, त्या समस्या आहेत हेच मुळी लोकांच्या लक्षात येत नाही.

श्रमाने अहंकार ठेचला जातो, हे त्रिकालाबाधित सत्य आहे! मग मोठ्या माणसांनी सुनावलेल्या खड्या बोलांचा राग येत नाही, धाकट्यांनी काळजीपोटी केलेल्या प्रेमळ सूचनांचा त्रास होत नाही, घरातल्या किंवा ऑफिसमधल्या आळशी माणसांनी न केलेल्या कामामुळे आपल्यावर वाढलेल्या बोजाचा अवाजवी त्रास होत नाही आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे मी कोणीतरी विशेष आहे, माझे काही अस्तित्व आहे आणि इतरांची मर्जी राखता राखता माझे अस्तित्व कसे नष्ट होत चालले आहे आणि काय माझ्या शिक्षणाचा उपयोग, चूल मूल शिवाय मला आयुष्य आहे किंवा मी काय पैसे कमावण्यासाठी आणि इतरांना आधार देण्यासाठीच जन्माला आलो आहे का, असे प्रश्न लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन पडणे कमी होते.

या पोस्टद्वारे आधुनिक शिक्षणाचा विरोध करायचा नसून आधुनिक शिक्षणामुळे केवळ लाभ नाही तर हानीही झाली, हे निदर्शनास आणणे आहे. आणि ती हानी वैचारिक, सांस्कृतिक पातळीवर घडून आली आहे, हे शोचनीय आहे.

जाता जाता एक वास्तवात घडलेला प्रसंग: माझी एक आंबेडकरवादी मैत्रीण होती. तिच्या मोठ्या बहिणीला जिने पदव्युत्तर शिक्षण घेतले तिच्या सासरी तिला खूप जाच होऊ लागला. त्याला अनेक कारणे होती पण त्यातील एक मुख्य कारण असे होते की ही बहीण पदव्युत्तर शिक्षण घेतले असल्या कारणाने शेतीत सासरच्यांची मदत करू इच्छित नव्हती. माझ्या मैत्रिणीचेही असे म्हणणे होते की शिक्षण घेतले तर तिने मोलमजुरीची, कष्टाची कामे का करावीत? हाच माझा मुद्दा आहे: शिक्षण घेतले की स्वतःच्या घरच्या शेतीतही काम करणे कमीपणाचे वाटावे, हे जे ब्रेनवॉश काही तथाकथित समाजसुधारकांनी गेल्या अडीचशे वर्षांत भारतीयांचे घडवून आणले आहे ना, ते आपल्या ऱ्हासास कारणीभूत ठरत आहे.

लेखिका – सुश्री परिज्ञा पुरी 

संग्राहक – मेघःशाम सोनवणे

मो – 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दिपज्योती नमोस्तुते ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

दिपज्योती नमोस्तुते ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

दीप हे अग्नीचे व तेजाचे प्रतिक आहे तर ज्योती हे ज्ञानाचे व बुद्धीचे प्रतिक आहे. मानवी  जीवनात दिव्याला फार महत्व आहे. कारण दिवसा तळपणारा सूर्य असतो पण रात्री अंधार नष्ट करण्यासाठी मानव निर्मित दिव्याची गरज असते.

पूर्वी प्रकाशासाठी व कुठेही नेण्याला सोपे असे कंदील, चिमणी वापरली जायची. देवळात काचेच्या हंड्यातील दिवे असायचे तर बाहेर दीपमाळ असते आणि गाभाऱ्यात नंदादीप अखंड तेवणारा!श्रीमंतांच्या दिवाणखान्यात हंड्या, झुंबरे असत. त्यांचा वापर मेणबत्या लावून व्हायचा. समूहासाठी आधी मशाली मग बत्त्या, नंतर पेट्रोमॅक्स चे दिवे आले. कंदील कालबाह्य झाले तसं घरोघरी विजेवर चालणारे दिवे आले. त्यांच्या अनिश्चिततेमुळे emergency दिवे, मेणबत्या आल्या. आता तर सोलर दिवे वापरात आले आहेत.पूर्वी सजावटीसाठी आधी तेलाच्या पणत्या, मग मेणाच्या पणत्या, अलिकडे विविध प्रकारच्या, विविध रंगांच्या, विविध आकारातल्या लाईट च्या, LED च्या माळा असतात.

अर्थात दिव्यांचे प्रकार, नमुने, त्यांचं सौंदर्य यात विविधता असली तरी त्यांची गरज बदलली नाही व आपली संस्कृतीही बदलली नाही.आजही तिन्हीसांजेला ‘दीपज्योती नमोस्तुते ‘ म्हणत देवघरात समई लावली जाते, तुळशीसमोर दिवा ठेवला जातो. कांहीही म्हणा पण तेल, तूप यात तेवणारी मंद ज्योत जी प्रसन्नता, मंगलता, सात्विकता, शुभकारकता यांची अनुभूती देते ती दुसरी कोणतीही ज्योत देऊ शकत नाही.आपण नकळत तिच्यासमोर नतमस्तक होतो.

आपल्या संस्कृतीत दीप प्रज्वलनाला फार महत्व आहे. दिवा तमनाशक असल्याने तो प्रकाशाची आस जागवणारा, ऊर्जा देणारा, शुभकारक!म्हणून कोणत्याही कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलनाने करतात. कोणतीही पूजा पूर्ण होईपर्यंत तेलाचा व तुपाचा दिवा तेवत ठेवलेला असतो. षोडशोपचारे पूजा करताना शंख, घंटा, कलश याबरोबर दिव्याची ही पूजा करतात. नवरात्रासारख्या कुळाचाराच्या वेळी किंवा अनुष्ठानाच्यावेळी अखंड दीप, नंदादीप ठेवला जातो. आषाढ अमावस्या दिव्याची अवस म्हणून साजरी केली जाते. दीपावली सारखा दिव्याचा सण साजरा करतो. दीप- आवली, म्हणजे दिव्यांची ओळ! कार्तिक पौर्णिमेला पाण्यात दिवे सोडले जातात.

तसं पाहिलं तर हिंदू संस्कृतीत अग्निलाच खूप महत्व आहे. तो अग्नेय दिशेचा रक्षक असून पंचमहाभूतांपैकी एक आहे. इंद्राखालोखाल महत्वाचा देव अग्नि आहे. हिंदू संस्कारात नामकरणापासून मृत्यूपर्यंत सगळे संस्कार अग्निच्या साक्षीने होतात. फक्त नामकरणादिवशी होम नसतो पण तेलाचे दिवे लावले जातात. अग्नि ही उर्जा असल्याने निर्मिती, पोषण, नाश सर्वांना कारणीभूत आहे. म्हणून अग्नि हा परिवर्तनशील मानतात. गर्भ निर्मिती करतो, पोषणाने त्याचे बाल्यात, मग शैशवात , तारुण्यात , गृहस्थात परिवर्तन करतो आणि  शेवटी देहाचा नाश करून मुक्त आत्म्याला  दुसऱ्या देहात परिवर्तीत करतो. कांही घरात संध्याकाळी अग्निहोत्र करतात. अग्निद्वारे होमातील आहुती देवांपर्यंत पोचविल्या जातात. होळीदिवशी अग्नीची पूजा केली जाते.

दिव्याचा एक प्रकार रोजच्या वापरातला म्हणजे निरांजन!निरांजन हा शब्दच किती शांत, मृदू, नि वत्सल आहे.मूळ शब्द निरंजन, निः + अंजन, पवित्र, निष्कपट, काजळी न धरणारे, शुभकारक, सकारात्मक उर्जेच्या स्पंदनांचे वहन करणारे!

आपल्याकडे ज्या ओवाळण्याच्या पद्धती आहेत त्या थोड्या सविस्तर सांगणार आहे कारण सिरीयल मधलं ओवाळणं पाहून हीच खरी पद्धत आहे असं वाटायला लागलंय.आपण

देवाला ओवाळतो त्याला देवाची आरती म्हणतात. आरतीसाठी ताम्हनात दोन निरंजने ठेवावी, त्यात तुपाच्या दोन दोन फुलवाती(फुलासारख्या दिसणाऱ्या कापसाच्या तयार केलेल्या )घालव्यात. कापूर घालून कापुरारती ठेवावी व अक्षता ठेवाव्या. आपण आरतीतून देवाची स्तुती करतो व त्याच्याकडे आशीर्वाद मागतो. त्यामुळे आरती करताना ज्या देवाची आरती करणार असू त्या देवावर अक्षता टाकायच्या व ओवळायचं. आरती झाली कि ज्योतीत जे तेज येतं किंवा देवाचा आशीर्वाद येतो, तो उपस्थित सर्वांना मिळावा यासाठी आरतीचं ताट फिरवतात. सगळे ओंजळीने ते तेज घेऊन मस्तकावरून तो हात फिरवतात. आरतीचं ताम्हन परत देवासमोर ठेवताना ताम्हनाखाली अक्षता ठेवतात. बऱ्याचवेळा आरती नंतर मंत्रपुष्प म्हणतात त्यावेळी उपस्थितांना फूल व अक्षता किंवा नुसत्या अक्षता देतात. उजव्या हातात अक्षता ठेवून त्यावर डावा हात झाकावा. म्हणजे त्या अभिमंत्रित होतात अशी कल्पना. मंत्रपुष्प झाल्यावर त्या अभिमंत्रित अक्षता देवावर वाहून नमस्कार करावा. कधी कधी निरंजना ऐवजी पुरणाचे पाच दिवे करून त्यात तुपाच्या पाच वाती लावून देवाची आरती करतात. नंतर कांही लोकांच्यात त्या पुरणाच्या आरतीने घरातल्या मुलांना ओवाळतात.ज्योतीमधील देवाचा आशिर्वाद मुलांना मिळावा यासाठी, (इथे सुपारी फिरवत नाहीत ) कारण हे ओवाळणे बहुधा श्रावण शुक्रवारी करतात त्यावेळी  आपण ज्या जीवतीच्या कागदाची पूजा व आरती करतो ती लहान मुलांचं रक्षण करणारी आहे.

अक्षताही पवित्र व सकारात्मकता वाहणाऱ्या मानतो. मूळ शब्द अक्षत, म्हणजे छिद्र किंवा जाळी नसलेला, म्हणून अक्षता करण्यासाठी अखंड तांदूळ घेऊन त्याला तेलाचा हात लावून कुंकवाने लाल करतात. तसेच फक्त देवाची पूजा, आरती करताना तूप व फुलवाती लागतात. एरवी केंव्हाही निरांजन किंवा दिवा, समई लावताना तेल व वळलेल्या वाती लागतात.

जेंव्हा आपण माणसांना ओवाळतो त्याला औक्षण म्हणतात. औक्षण म्हणजे आशिर्वाद देणे, दृष्ट काढणे.उदा. वाढदिवस, यासाठी ताम्हनात दोन निरांजने घ्यावीत, त्यात वळलेल्या वाती, प्रत्येक निरांजनात दोन दोन च्या दोन, अशा एकूण आठ वाती व तेल घालतात. ताम्हनात अक्षता व सुपारी ठेवावी. सोन्याची अंगठी प्रत्येक घरात असेलच असे नाही त्यामुळे ती हौस म्हणून असेल तर घ्यावी. महत्व सुपारीला आहे.ज्याचं औक्षण करायचं त्याला उभं किंवा गोल (मुलगा, मुलगी याप्रमाणे )कुंकू लावावे.हे मात्र कुठल्याही प्रसंगी ओवाळताना लावावे.मुलाला उभे कुंकू लावणे यालाच नाम ओढणे म्हणतात. मग डोक्यावर अक्षता टाकून एकदा ताम्हन गोल फिरवावे,हातात सुपारी घेऊन ओवाळणाऱ्याने आपल्या डाव्याबाजूने उजवीकडे अर्धगोलात सुपारी फिरवावी व ताम्हनात टेकवावी, मग उजवीकडून डावीकडे ताम्हनात टेकवावी व शेवटी आणखी एकदा डावीकडून उजवीकडे आणून ताम्हनात ठेवावी. त्यापूर्वी कांही ठिकाणी सुपारी व अंगठी कपाळाला लावतात. हे औक्षण आशीर्वादाचे असल्यामुळे मोठ्यानी छोट्याना ओवाळायचे असते. याशिवाय गणपती, गौर आणणाऱ्यालाही पायावर दूध पाणी घालून दारातून आत आल्यावर ओवाळतो. तेंव्हा आशिर्वाद द्यायचा नसल्याने सुपारी फिरवत नाहीत फक्त दोनदा अक्षदा टाकून ताम्हन फिरवतात. कदाचित ते फक्त देवाचं स्वागत असावं. असं ओवाळून स्वागत, जिंकून आलेल्या व्यक्तीचं दारात करतात.

भाऊबीज, रक्षाबंधन, पाडवा हे नाजूक बंध असणाऱ्या नात्यासाठीचे सण असतात. त्यावेळी ओवाळणी घालणं असल्यामुळे  वयाचा विचार केला जात नाही. ओवाळताना सुपारी फिरवली जात नाही. ज्याला ओवाळतो त्याच्या हातात सुपारी द्यायची व त्याने ती ओवाळणीसह ताम्हनात ठेवायची. ओवाळणी म्हणून एक रुपायचं नाणं सुद्धा चालतं, एकमेकांतलं प्रेम ओवाळणी पेक्षा महत्वाचं असतं.नेहमीप्रमाणे दोनदा अक्षता टाकून ताम्हन फिरवायचं.

मोठ्यांच्या 61,75,81,100 अशा महोत्सवाच्या वेळी वयाएवढ्या वातीनी ओवाळतात, त्यावेळी ओवाळणारे बहुधा त्या व्यक्तीपेक्षा लहानच असतात त्यामुळे फक्त वातींचे ताट फिरवतात.

अर्थात यांसगळ्या गोष्टी श्रद्धेच्याच आहेत. हे असंच का याला तर्कशुद्ध उत्तर देता येणार नाही. कदाचित कुटुंबातील सर्वांना एकमेकांशी प्रेम भावनेने जोडून ठेवावं, प्रत्येकाला कुटुंबात कांही विशिष्ट स्थान असावं, कर्तव्याची, जबाबदारीची जाणीव असावी, घर आनंदी असावं. आपलं कुटुंब कोणत्याही संकटापासून दूरअसावं, एवढाच निर्मळ विश्वास किंवा आशावाद असावा.श्रद्धेचा पाया असला कि नात्यांची इमारत सहज कोसळत नाही. आणि असंच करावं, अशी पद्धत घालून दिली कि आत्मियतेने गोष्टी केल्या जातात.ऊरका पाडून प्रसंगाचं, सणाचं महत्व कमी होऊ नये यासाठीही!

दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसः तेज उत्तमम् l

गृहाणं मत्कृतां पूजा, सर्वकाम प्रदो भवः॥

हे दीपदेवा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामधे उत्तम तेज आहेस, माझ्या पूजेचा स्विकार कर. माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अक्षय तृतीया…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “अक्षय तृतीया…” ☆ सौ राधिका भांडारकर 

अक्षय तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो.  यावर्षी अक्षय तृतीया १० मे ला साजरी होत आहे.  हा सण गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेशसह संपूर्ण उत्तर भारतात साजरा केला जातो.

अक्षय याचा अर्थ ज्याचा क्षय होत नाही ते.  या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असा संकेत आहे.  या दिवशी आपण दान केले तर विपुल प्रमाणात ज्या वस्तूंचे दान केले त्या पुन्हा आपल्याजवळ प्राप्त होतात अशी भावना आहे.

अक्षय तृतीया सणाच्या संदर्भात अनेक पौराणिक कथा आहेत.  भारतीय संस्कृतीचा इतिहास आणि काही पौराणिक कथानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत.

याच दिवशी भगवान गणेशांना वेदमहर्षी व्यासांनी महाभारताचे काव्य सांगण्यास सुरुवात केली होती. 

अक्षय तृतीया म्हणजे भगवान विष्णूचा सहावा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुराम यांचा जन्मदिवस आहे.

अक्षय तृतीयेच्या दिवशी नरनारायण आणि हयग्रीव यांचाही जन्म झाला होता.

अक्षय तृतीयेला सत्ययुग संपून त्रेता युगाचा प्रारंभ झाला असं म्हणतात.

हा दिवस म्हणजे  माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस आहे.  त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णेची आराधना केल्यास आयुष्यभर घरात सुखसमृद्धी नांदते.

याच  दिवशी  श्रीकृष्णाने मित्र सुदाम्याचे दारिद्र्य संपवले.

वनवासी असलेल्या पांडवांसाठी श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षयपात्र भेट दिले होते ज्याचा उल्लेख ‘द्रौपदीची थाळी’ असा केला जातो ज्यामुळे वनवासातही पांडवांना कधीही उपासमार घडली नाही.

अक्षय तृतीयेलाच पृथ्वीवर गंगा अवतरली होती.

भगवान कुबेराने श्री लक्ष्मी मातेची आराधना केली ज्यामुळे कुबेराला देवांचा खजिनदार म्हणून नेमण्यात आले.

जैन बांधव हा दिवस भगवान आदिनाथ यांच्या स्मरणार्थ साजरा करतात.

जगन्नाथ पुरी येथे याच दिवसापासून रथयात्रेला सुरुवात होते असा हा साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला एक मंगल पवित्र दिन!

अक्षय तृतीयेचा हा सण खानदेशात मात्र अगदी दिवाळी सारखाच साजरा केला जातो.  तिकडे या सणास आखाजी असे म्हणतात.

आखाजी हा जसा सासुरवाशिणींचा सण तसेच तो पितरांचाही सण मानला जातो. खरं म्हणजे हा शेतकरी बांधवांचा सण. मातीशी अतूट नातं सांगणारा सण. या दिवशी शेतमजुरांना सुट्टी असते.  सालगडी (सालदार) यांची नवी कामेही ठरविली जातात.  खानदेशातील आगळीवेगळी अक्षय तृतीया परंपरा आजही तितक्याच, भक्तीभावाने,  उत्साहाने पाळली जाते.  या सणाला अक्षय घट म्हणजे पाण्याची घागर भरली जाते.

वसंत ऋतू संपून ग्रीष्माची चाहूल लागते. घागर हे त्याचं प्रतीक आहे.  या घागरीवर छोटे मातीचे भांडे ठेवले जाते त्यावर खरबूज,  सांजोऱ्या,  आंबे ठेवले जातात. यातील छोटे भांडे हे पितरांसाठी असते.  आधी ह्या पितरांना पाण्याचा घट दिला जातो त्यानंतरच नवीन माठ आणून घरात वापरला जातो.

पाटावर धान्य पसरून सभोवती रांगोळी घालून त्यावर या घटाची पूजा केली जाते.  या पूजेला ‘घागर भरणे’ असेही म्हटले जाते.  पितरांचे श्राद्ध किंवा तर्पणविधी या दिवशी केला जातो.  घरातल्या उंबरठ्याचे औक्षण करून आपल्या पूर्वजांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले जाते.  एकेका पूर्वजांची नावे घेऊन त्यांना आमंत्रण दिले जाते व चुलीवर पितरांना घास अर्पण केला जातो.  या दिवशी घरोघरी पुरणपोळी, आमरस, कटाची आमटी,(रश्शी) कुरडया, पापड,  भजी असा साग्रसंगीत नैवेद्य दाखवला जातो.

अक्षय तृतीया— आखाजी हा श्रमण संस्कृती दर्शविणारा  कृषी उत्सव आहे.याच दिवसापासून शेती  कामाला सुरुवात होते.  हलोत्सव, वप्पमंगल अशी वेगवेगळी नावे या सणाला आहेत.

आखाजी म्हणजे माहेराचा  विसाव्याचा आरामाचा सण. सासरी कामाच्या घबाडग्यातून मुक्त होऊन माहेरी लाडकोड, कौतुक करवून घेण्याचा सण.

घरोघरी उंच झाडाला झुले बांधले जातात. खानदेशात सासुरवाशिण लेकीला गौराई म्हणतात आणि जावयाला शंकर.

“ वैशाखाच उन्हं

 खडक तापून लाल झाले वं माय”

 

“झुयझुय पानी व्हाय तठे कसाना बाजार वं

 माय माले बांगड्या ली ठेवजो ली ठेवजो

बंधूंना हातमा दी ठेवजो दी ठेवजो

बन्धु  मना सोन्याना सोन्याना

पलंग पाडू मोत्याना मोत्याना”

 

“ गडगड रथ चाले रामाचा

नि बहुत लावण्याचा

सोला साखल्या रथाला

नि बावन खिडक्या त्याला”..

अशी गोड बोली भाषेतील अहिराणी गाणी सख्या झुल्यावर झुलताना आनंदाने गातात, अक्षय तृतीयेच्या निमित्ताने जपलेली ही लोकपरंपरा अतिशय लोभस आहे.

ऋतुचक्र फिरत असते.  एका मागून एक ऋतू बदलतो. वसंत सरतो ग्रीष्म येतो. आपले सारेच भारतीय सण नव्या ऋतुच्या स्वागतासाठी पारंपरिक आणि शास्त्रयुक्त पद्धतीने साजरे केले जातात. त्यातलाच हा अक्षय तृतीयेचा सण.  पाण्याची घागर भरून उन्हाळ्याचे स्वागत करणारा सुंदर सण!!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अक्षय्य तृतीया मुहूर्त खास…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

🌸 विविधा  🌸

☆ अक्षय्य तृतीया मुहूर्त खास…सौ. रेणुका धनंजय मार्डीकर 

विशाखा नक्षत्र येई पौर्णिमा

आला पहा वैशाख मास हा

साडेतीन मुहूर्तातील एक

अक्षय्य तृतीया मुहूर्त खास हा

अक्षय्य तृतीया, पितृ, देव व शुभ तिथी, वसंतोत्सव, दोलोत्सव चंदन यात्रा दिन, अखतारी, आखिती व आख्यातरी (गुजरात) अशा अनेक नावाने परिचित असलेला हा सण भारतातील प्रत्येक घरात संपन्न केला जातो.

या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात. या दिवशी आपण ज्या वस्तूंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात म्हणून अक्षय तृतीयेचे विशेष महत्त्व समजले जाते. वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय्य तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या प्राचीन संस्कृती, परंपरांमध्ये साडेतीन मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत. त्यापैकी एक अक्षय्य तृतीया असल्यामुळे यालाही अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही म्हणून ही तिथी अक्षय मानली गेली आहे. हे सांगताना श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अक्षय्य तृतीयेचे व्रत सांगितले.

शाकल नावाच्या नगरात ‘सुनिर्मल’ वाण्याने हे व्रत केल्याने दुसऱ्या जन्मात तो ‘कुशावती’ नगरीचा राजा झाला अशी एक कथा आहे. ‘नाभी’ व ‘मरुदेव’ यांचे पुत्र ऋषभदेव हे भगवान विष्णूचे अवतार होते. त्यांची परीक्षा पाहण्यासाठी इंद्राने धरतीवर पाऊस पाडला नाही. तेव्हा ऋषभदेवाने आत्मसामर्थ्याने पाऊस पाडून धरती सुजलाम-सुफलाम केली. तेव्हा प्रभावित होऊन इंद्राने आपली कन्या ‘जयंती’ हिचा ऋषभदेवांबरोबर विवाह लावून दिला. ऋषभदेवांना शंभर मुले झाली. गंगा, यमुनेच्या मधल्या भूमीचा राजा व ऋषभदेवांचा मुलगा ‘ब्रह्मावर्त’ याला त्यांनी जो आध्यात्मिक उपदेश केला तो विश्व प्रसिद्ध आहे. ज्येष्ठ पुत्र ‘भरत’ याच्या स्वाधीन राज्यसत्ता देऊन त्यांनी विदेही अवस्थेत कोंक, कुटक, कर्नाटक या दक्षिणेकडील प्रदेशात बराच प्रवास केला. एकदा ते अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हस्तिनापूरचा राजा ‘श्रेवांस’ याच्या घरी गेले. तेव्हा राजाने त्यांना ऊसाचा रस पिण्यास दिला त्यामुळे त्यांच्या भोजनशाळेतील अन्नदेवता व हस्तिनापूरचे ऐश्वर्य अक्षय्य टिकले म्हणून आजही हस्तिनापूर उर्फ दिल्ली शहर संपन्न राजधानीचे ठिकाण आहे.

देव आणि पूर्वज यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य (अविनाशी) होते. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो सर्व पापांतून मुक्त होतो, अशी मान्यता आहे. या दिवशी विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते.

अक्षय्य तृतीयेपासून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला, असे मानले जाते. अक्षय्य तृतीयेपासून चारधाम मानल्या गेलेल्या बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीची द्वारे खुली केली जातात. याच दिवशी नर-नारायण यांचे अवतरण झाले होते अशी मान्यता आहे. त्रेतायुगातच महाभारत घडले होते. याच युगात जगत्कल्याणासाठी भगवान विष्णू श्रीकृष्ण अवतारात प्रगट झाले आणि कालातीत असलेल्या भगवद्गीतेची अमृतवाणी संसाराला प्राप्त झाली. त्याचप्रमाणे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हयग्रीव आणि बसवेश्वर यांचा जन्म झाला होता.

विविध राज्यांमध्ये अक्षय्य तृतीया वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. या दिवशी ओरिसा व बंगाल प्रांतात परस्परांना चंदनाचे तेल लावून तीन आठवडे चालणाऱ्या ‘चंदनयात्रा’ या उत्सवाची सांगता करतात. जगन्नाथ पुरीला मदनमोहनाच्या मूर्तीला चंदनाचे तेल लावून शोभायात्रेने नरेंद्र तलावात नौकाविहार करतात. गुजरातमध्ये द्वितीयेला गावाबाहेर धान्य, कापूस व साखर या वस्तुंचे एक नगर तयार करतात. त्यामध्ये एक तांब्याचे नाणे ठेवून त्याला ‘राजा’ व त्याच्याजवळ एक सुपारी ठेवून तिला ‘दिवाण’ असे म्हणतात. गावातील सर्व लोक हे नगर पाहण्यासाठी जातात. या नगरीतील जे धान्य मुंग्यांनी वाहून नेले असेल ते धान्य महागणार किंवा त्याचे पीक चांगले येणार नाही असे भाकीत केले जाते व ज्या दिशेला मुंग्या कापूस घेऊन जातात त्या दिशेला कापसाची निर्यात करतात.

राजस्थानातील शहरी आणि ग्रामीण भागात या दिवशी विवाह करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रातील खान्देश मध्ये अक्षय तृतीयेच्या सणाला ‘आखाजी’ म्हणून ओळखले जाते. खान्देशात आखाजीचा हा सण दीपावली इतकाच महत्त्वाचा गणला जातो.

अक्षय्य तृतीया सागर भरती

नौकाविहारा कोणी न जाती

उसळो ना सागर, रहावी शांती

सागरोत्सव अक्षय्य संपन्न करती

अक्षय्यतृतीया ते श्रावण पौर्णिमेपर्यंत समुद्र खवळलेला असतो म्हणून या महिन्यात समुद्रपर्यटनाला कोणीही जाऊ नये. या काळात सागराने त्रास देऊ नये म्हणून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गुजरातमध्ये सागराची पूजा करण्यासाठी ‘सागरोत्सव’ संपन्न केला जातो.

कोकणात कुमारीकांना घरी आमंत्रित करून त्यांच्या अंगाला चंदनाचे उटणे लावून शिरा असलेला शंख फिरवितात व पाद्यपूजा करून कैरीचे किंवा दाह कमी करून पचनशक्ती वाढविणारे कोकमचे सरबत पिण्यास देऊन गुलकंद व मोरावळा खाण्यास देतात. या दिवशी शेतीच्या कामाला प्रारंभ केला जातो.

साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी व्यवसायास प्रारंभ करतात. आपल्या पूर्वजांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला पूर्वजांच्या स्मरणार्थ पूजा करून, त्यांना प्रथम आमरसाचे जेवण देऊन मगच आंब्याचा रस सेवन केला जातो अशी प्रथा, परंपरा आहे.

अक्षय तृतीया दिन भाग्याचा

अक्षय घट तो भरू पाण्याचा

पलाशपत्रे रास गव्हाची

आंबे ठेवून पूजा त्यांची

कुंभार वाड्यातून मातीचा कलश आणून पळसाच्या पत्रावळीवर गव्हाची रास घालून त्यावर कलश ठेवून त्यात पाणी भरावे व आपल्या पूर्वजांसाठी तीळ तर्पणविधी करून ते कलश आमंत्रित केलेल्या व्यक्तिला दक्षिणेसहित दान देऊन आंब्याच्या रसाचे जेवण घालावे.आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ देह, नेत्र, रक्त, वस्त्र, धन, जमीन, विद्या, पायातील जोडा, छत्री, जलकुंभ, पंखा, विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य दान करावे. अक्षय तृतीयेला सत्य, कृत व त्रेता या युगांचा प्रारंभ झाला असून नर-नारायण, हयग्रीव व परशुराम यांचे जयंती उत्सव संपन्न करून, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाने चैत्रगौरी उत्सवाच्या सांगतेबरोबर अक्षय्य तृतीया हा सण संपन्न करतात.

वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या निमित्याने मातीचे माठ किंवा रांजण दान करावे. मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम असते, तसेच फळांचा राजा आंबा प्रामुख्याने अक्षय तृतीयेपासून खाण्यास सुरुवात होते. अक्षय्य तृतीयेला केलेले नामस्मरण किंवा मंत्र पठण अखंड टिकून राहते अशा मान्यता आहेत. याशिवाय अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवी प्रकट झाली होती, असेही सांगितले जाते.

कृतज्ञता पितरांच्या प्रती

आशीर्वच भरभरून देती

कृपाच त्यांची मिळण्या यशप्राप्ती

अक्षय अखंड अक्षय्य तृतीया ती

*

पूर्वज सांगून गेले आम्हा

परंपरा साऱ्या येतील कामा

पाऊलखुणांवर आम्ही चालतो

अक्षय्यदिनी या पूर्वजास स्मरतो

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ७ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र – देवावरची आम्हा मुलांच्या मनातली श्रद्धाही त्यांच्यासारखीच पूर्णत: निखळ रहाणं आणि आमच्या मनात अंधश्रद्धेचे तण कधीच रुजू न देणं ही आमच्या आईबाबांनी आम्हा भावंडांना दिलेली अतिशय मोलाची देनच होती!)

जवळजवळ साठ एक वर्षांनंतरही या सगळ्याच आठवणी आजही माझ्या मनात अतिशय ताज्या आहेत. आमच्या अंगणातलं ते छोटं बैठं देऊळ, त्या प्रसादपादुका, तरारून वर झेपावलेला औदुंबर, बाबांना प्राप्त झालेली वाचासिध्दी हे सगळं कुणालाही चमत्कार वाटेल असंच असलं तरी माझ्या बाबांपुरतं सांगायचं तर ती फक्त त्यांनाच उमजलेली अशी अंतर्ज्ञानाची एक खूण होती फक्त!

बाबांना प्राप्त झालेली वाचासिद्धी त्या पोरवयात माझ्यासाठीही अतिशय औत्सुक्याचा विषय होती. पण बाबांनी मात्र ते अगदी सहजपणे स्वीकारलेलं होतं.अतिशय खडतर आणि प्रतिकूल वाटाव्या अशा आपल्या संपूर्ण आयुष्यांतही त्यांच्यातलं हे वेगळेपण त्यांनी स्वतःचे पाय जमिनीवरच घट्ट ठेवून आतल्याआत जपलं होतं.त्यांना प्राप्त झालेला हा परमेश्वराचा आशीर्वाद कुठल्याही प्रकारचं अवडंबर न माजवता, स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच त्याचा वापर न करता, इतक्या निगुतीने त्यांनी कसा जपला  असेल याचे आज आश्चर्य वाटते एवढे खरे!

त्यांच्यावरील श्रद्धेपोटी मनातले प्रश्न घेऊन आजूबाजूची परिचितांपैकी अनेकजणं बाबांना सहज म्हणून भेटायला यायची आणि मनातली रुखरुख व्यक्त करून त्यांच्यासमोर आपलं मन मोकळं करायची.बाबा मोजक्या शब्दात त्यांची समजूत घालून त्यांना मार्गदर्शन करायचे.’सगळं व्यवस्थित होईल,काळजी नका करू’ हे त्यांचे शब्द आधारासारखे सोबत घेऊन आलेली माणसं परत जायची. एकदा तिथे जवळच बसलेल्या मी मनातल्या औत्सुक्यापोटी बाबा एकटे आहेत असं पाहून ‘तुम्हाला हे सगळं कसं समजतं?’ असं त्यांना विचारलं तेव्हा माझी चेष्टा केल्यासारखे ते खळखळून हसले.म्हणाले,”अरे मला सगळं कुठून काही समजायला?इथं माझं मला झालंय पुरे. पण ही माणसं येतात,मन मोकळं करतात. परिस्थितीने कातावलेली असतात बिचारी. त्यांना झिडकारून नाही ना चालणार? त्यांचं दडपण कमी करावं, त्यांनी स्वस्थचित्तानं विचार करून स्वतःच त्यातून मार्ग शोधण्यास प्रवृत्त व्हावं म्हणून त्यांना बरं वाटेल अशा चार अनुभवाच्या गोष्टी सांगतो झालं. बाकी कांही नाही अरे.खरं सांगू का? मी बोलेन,सांगेन ते, ही सगळी माणसं म्हणतात तसं खरंच खरं ठरत असेल तर त्याचा कर्ताकरवता ‘तो’!..’मी’ नाही..” बाबा गंभीर होत म्हणाले होते. असं असलं तरी बाबांनी त्या माणसांना सांगितलेल्या गोष्टींची प्रचिती प्रत्येकाला यायचीच आणि नंतर ते कृतज्ञता व्यक्त करायला बाबांना आवर्जून भेटायलाही यायचे. या सगळ्या मागचं रहस्य शोधायचा प्रयत्न बाबांनी कधीच केल्याचं मला आठवत नाही. त्यांच्या मनातली श्रद्धा, वेळोवेळी त्यांना आलेले अनुभव यांनी भारावून न जाता प्रतिकूल परिस्थितीतही ते शांत,हसतमुख रहायचे.या पार्श्वभूमीवर याच संदर्भात एक दिवस अचानक आश्चर्य वाटावं असा एक थरारक प्रसंग घडला!

किर्लोस्करवाडी हे वरिष्ठांचे बंगले सोडले तर फारफार तर दीड दोनशे उंबऱ्यांचं एक काॅलनीत वसलेलं गाव.बॅंक आणि पोस्ट या कंपनीसाठी अत्यावश्यक सेवा असल्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठीही काॅलनीतली घरे राखून ठेवलेली असायची. त्यामुळेच अतिशय शांत,आनंदी, संस्कारपूर्ण अशा वातावरणातलं समृध्द बालपण मला अनुभवता आलं.

प्रत्येक घराच्या पुढेमागे असणारी फळाफुलांची भरपूर झाडं आणि प्रशस्त अंगण हे तिथल्या जवळजवळ दशकभराच्या वास्तव्यात आम्ही अनुभवलेलं खरं ऐश्वर्य ! अंगणातला जांभळाचा मोठा वृक्ष हे इतर घरांच्या तुलनेतलं आमच्या घराचं एक खास वेगळं वैशिष्ट्य होतं. त्या प्रशस्त वृक्षाच्या चोहोबाजूंनी पसरलेल्या प्रत्येक फांदीला पिकलेल्या टपोऱ्या जांभळांचे घोसच्याघोस लगडलेले असायचे. ते पाहूनच आम्हा मुलांच्या तोंडाला पाणी सुटायचं. पण आम्हाला झाडावर चढून जांभळं काढायची बाबांनी मनाई केलेली होती. जांभळाचं लाकूड अतिशय ठिसूळ असतं, आम्ही पडू, आम्हाला इजा होईल या काळजीपोटी ते स्वतः रोज एकदा झाडावर चढून स्वत:चार जीव धोक्यात घालून आम्हाला भरपूर जांभळं काढून द्यायचे. ते ऑफिसला गेले की आम्ही गुपचूप झाडावर चढून आपापली जांभळं काढून खायचा बालसुलभ आनंद मिळवायचो पण तेही आईला नकळतच.

काॅलनी छोटी असल्यामुळे कॉलनीतील सर्वांचाच घरोबा असे. कुणाच्याच मनात आपपर भाव नसे.

तोच हक्क गृहित धरून, पलीकडच्या गल्लीत रहाणारे श्री. रामभाऊ सुतार एक दिवस हातात  रिकामी पिशवी घेऊन आमच्या घरी आले. बरोबर त्यांची बायकोही होती. तो रविवार असल्याने बाबा घरीच होते.

“दादा,थोडी जांभळं काढावी म्हणतो.”रामभाऊ म्हणाले.

बाबांनी क्षणभर विचार केला. त्यांना ‘आत या,बसा’ म्हणाले.बाबांनी स्वतःच झाडावर चढून सकाळी मोठ्ठं पातेलं भरून पिकलेली टपोरी जांभळं काढून आत ठेवली होती.ते पातेलं त्यांनी बाहेर आणलं.

“ही जांभळं नुकतीच काढलीत.ती पिशवीत भरुन घेऊन जा” ते म्हणाले.

“नको दादा.यात स्वत: झाडावर चढून जांभळं काढायची मजा कुठून येणार? ती

तुमची तुम्ही ठेवा आत. माझी मी काढून घेतो.” रामभाऊ म्हणाले आणि उठून बाहेर गेले.

बाबांना काय करावं सुचेना. ते एकाएकी गंभीर झाले. झपकन् उठून बाहेर आले.

“रामभाऊ, ऐका माझं. जांभळाचं लाकूड खूप नाजूक असतं. या झाडाखाली मोठे दगड आहेत. फांदी तुटून पडलात तर जीवावर बेतेल. झाडावर चढू नकाss”

रामभाऊ खिल्ली उडवल्यासारखे मजेत हसले.

“दादा, अहो मला असा तसा समजलात की काय? असली छप्पन झाडं मी    बघितलीत. नका काळजी करू.”

“काळजी मी नाही, तुम्ही स्वतःची घ्यायला हवी. सांगतोय ते  ऐका. तुम्ही अशी छप्पन्न झाडं पाहिली असतील, पण हे सत्तावनावं झाड कायम लक्षात रहाणारं ठरणाराय लक्षात ठेवाs ऐका माझं. झाडावर.. चढू .. नकाss”

बाबांचं न ऐकता, त्यांच्याकडं पहात रामभाऊ चिडवल्यासारखं हसले आणि हातातली पिशवी सावरत झाडावर चढू लागले.

त्या क्षणीचा बाबांचा चिंताग्रस्त चेहरा मला आजही आठवतोय. काय करावं ते न सुचून बाबा आत आले. अस्वस्थपणे येरझारा घालत राहिले. पाच एक मिनिटे त्याच अस्वस्थतेत गेली. तोवर टपोऱ्या जांभळांच्या घोसांनी भरत आलेली पिशवी जवळच्याच एका फांदीला अडकवून, त्याच फांदीवर सायकलवर बसतात तशी टांग टाकून रामभाऊ बसले होते. ते खाली उतरायचा विचार करीत असतानाच,समोर दिसणाऱ्या जांभळांच्या भलामोठ्या घोसाच्या ते मोहात पडले.पण थोडं पुढं वाकून हात लांब करुनही तो घोस हाताला लागेना,तसं जिद्द (कि हव्यास?)न सोडता रामभाऊ आणखी थोडं पुढं वाकले न् त्याच क्षणी……?

फांदी मोडत असल्याचा कडकड आवाज ऐकू आला आणि आत अस्वस्थतेने येरझारा घालणारे बाबा धास्तावून थिजल्यासारखे उभे राहिले. स्वतःला सावरत कसेबसे ते बाहेर धावले तोवरच्या क्षणार्धात रामभाऊ मोडकी फांदी आणि जांभळांनी भरलेली पिशवी यांच्यासकट खाली कोसळले. बाबा झरकन् पुढं धावले तसं अंगणात उभे असलेले इतरही एकदोघे मदतीला पुढे आले.रामभाऊंची बायको तर भेदरुन थरथरत उभी होती!

खालच्या दगडांचा मार लागून झालेल्या पायाच्या रक्ताळलेल्या जखमा आणि मुक्या माराच्या वेदना आतल्याआत सहन करत कसनुसं हसत रामभाऊ उठायचा प्रयत्न करत होते त्यांना सर्वांनी कसंबसं सावरलं.

रामभाऊ न जुमानता झाडावर चढलेले पाहून घाबरलेले,अस्वस्थतेने येरझारा घालणारे बाबा मला आठवतात तेव्हा घडलेली घटना कावळा बसताच फांदी मोडायला निमित्त होणाऱ्या योगायोगासारखी निश्चितच नव्हती याची मनोमन खात्री पटते. बाबांना मिळणाऱ्या अगम्य अशा भविष्यसूचक संकेतांच्या वाचासिद्धीसदृश इतर सकारात्मक प्रचितींच्या तुलनेतला हा काळजाचा ठोका चुकवणारा एक अपवादात्मक अनुभव मनात बाबांच्या आठवणींना चिकटून बसलाय..!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares