मराठी चित्रसृष्टीतले भीष्माचार्य, कोल्हापूरची शान वाढवणारे “जयप्रभा स्टुडिओ”चे मालक, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कवी, नव्या कलाकारांना घडवणारे मूर्तिकार अशी असंख्य बिरुदे ज्यांना लावता येईल त्या भालजी पेंढारकर यांचा आज स्मृतीदिन
भालजी पेंढारकरांनी कोल्हापूर हे मराठी चित्रपट बनवण्याचे प्रमुख केंद्र बनवले. त्यांच्या जयप्रभा स्टुडिओ मधून एकाहून एक उत्तम चित्रपट निर्मिले गेले. भालजींचे चित्रपट किंवा त्यांची निर्मिती संस्था म्हणजे कलाकार व तंत्रज्ञ घडवणारी एक मोठी कार्यशाळाच होती. तसेच त्यांचा संच म्हणजे कुटुंबच होते. शिस्तबद्धता, वेळापत्रकानुसार काम, कामांचे नेटके वाटप, स्तोत्रपठण, प्रार्थना, रेखीव दिनक्रम, वगैरे…
चित्रपटाच्या माध्यमातून भालजींनी सुलोचनादीदी, चंद्रकांत मांडरे, सूर्यकांत मांडरे, जयश्री गडकर असे असंख्य कलाकार घडवले. शिवाजीराजांचा चा काळ आणि त्या काळातील व्यक्तिरेखा व प्रसंग ही भालजींच्या चित्रपटांची प्रमुख वैशिष्ट्ये होती. त्यांच्या युगप्रवर्तक अशा कारकिर्दीमुळे भालजींना यथार्थतेने चित्रतपस्वी असे म्हटले जाते.
१९४८ मध्ये गांधीजींची हत्या झाल्यानंतरच्या दंगलीमध्ये भालजींचा कोल्हापूर येथील जयप्रभा स्टुडिओ जाळला गेला. नुकताच तयार झालेला मीठभाकर व बाळ गजबरांचा “मेरे लाल” हे चित्रपट आगीत भक्षस्थानी पडले. दीडशे ते दोनशे कामगार बेकार झाले. भालजींनी पुन्हा लाखो रुपये खर्चून जयप्रभास परत उभे केले. जिद्दीतून मीठभाकर व मेरे लाल ची पुनर्निर्मिती केली. मीठभाकरने चांगला व्यवसाय केला. भालजींनी कोल्हापुरात मराठी चित्रनिर्मितीस पुन्हा एकदा वेग मिळवून दिला.
भालजींचे चित्रपट
आकाशवाणी, कान्होपात्रा, कालियामर्दन, गनिमी कावा, गोरखनाथ, छत्रपती शिवाजी, नेताजी पालकर, बहिर्जी नाईक, भक्त दामाजी, मराठा तितुका मेळवावा, महारथी कर्ण, मीठभाकर, मोहित्यांची मंजुळा, राजा गोपीचंद, वाल्मिकी, साधी माणसं, सावित्री, सुवर्णभूमी
भालजींनी योगेश या नावाने गाणी लिहिली ती गाणी देखील लोकप्रिय आहेत.
१) अखेरचा हा तुला दंडवत
२) अरे नंदनंदना
३) डौल मोराच्या मानच्या र
४) तुझी माझी प्रीत जमली नदीकाठी
५) माझ्या कोंबड्याची शान
६) माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जात
७) राजाच्या रंगमहाली
९) वाट पाहुनी जीव शिणला
१०) चल चल जाऊ शिणुमाला.
सिनेसृष्टीतला दादासाहेब फाळके हा अत्युच्च पुरस्कार त्यांना १९९१ साली प्रदान केला गेला.
भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट काढले होते.
नागपुरातील धंतोली्वर त्या रात्री एक सुरांची अविस्मरणीय मैफिल जमली होती. तसं म्हटलं तर ती सगळी तरुण मुलंच होती. समोर श्रोत्यांमध्ये मात्र नागपुरातील जाणकार, बुजुर्ग संगीतप्रेमी होते. सुरांची ती अचाट मैफिल संपल्यानंतर समोर बसलेल्या, मैफीलीत रत असलेल्या श्रोत्यांना दाद देण्याचेही भान राहिले नव्हते. काहीतरी अलौकिक घडल्यानंतर, अनुभवल्यानंतर वातावरणात भिनलेली ती धुंद शांतता… ती अनुभवणारा तो गायक… त्याचे साथीदार…
आणि अचानक श्रोत्यांमधील एक बुजुर्ग, म्हातारा विचारता झाला…
“काहो देशपांडे… आपले घराणे कुठले ?
“आमच्यापासून सुरू होणार आहे आमचं घराणं…. ” त्या गायकाने ताडकन उत्तर दिले… आणि
दिवाणखान्यात बसलेल्या रसिक नागपुरकरांनी आता मात्र टाळ्यांचा कडकडाट केला.
तिशीच्या आसपास असलेला तो गायक होता… वसंतराव देशपांडे.. तबल्यावर मधु ठाणेदार… आणि पेटीच्या साथीला साक्षात पु. ल. देशपांडे.
कोणत्याही एकच घराण्याची शागिर्दी न पत्करता वसंतरावांनी अनेकांकडे सुरांची माधुकरी मागितली. आणि ती त्यांना मिळालीही. नागपुरात असलेल्या शंकरराव सप्रे गुरुजींकडे वसंतरावांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. सप्रे गुरुजींच्या त्या गायनशाळेत त्यावेळी वसंतरावांबरोबर अजून एक शिष्य गायनाचे धडे गिरवत होता. दोघेही पुढे जाऊन आपल्यागुरुचे नाव त्रिखंडात गाजवतील याची सप्रे गुरुजींना कल्पनाही नसेल. त्यावेळी वसंतरावांबरोबर शिकणारा त्यांचा जोडीदार होता… राम चितळकर…. म्हणजेच सी. रामचंद्र.
नागपुरातील सप्रे गुरुजींनी गायकीचे प्राथमिक धडे तर दिले… पण आता पुढे काय?
नेमके त्याच वेळेला वसंतरावांचे मामा नागपुरात आले होते. ते रेल्वेत नोकरीला होते. लाहोरला. मामाने त्यांना आपल्याबरोबर लाहोरला नेले. त्याकाळी लाहोरला मोठमोठ्या गवयांचे वास्तव होते. अनेक मुसलमान गवयांची मामाची ओळख होती.
कुठूनतरी वसंतरावांना समजले. रावी नदीच्या पलिकडे एक कबर आहे. तेथील विहिरी जवळ काही फकीर बसतात. ते उत्तम गवयी आहेत. वसंतराव तेथे जाऊ लागले. गाणे ऐकू लागले. मामाने पण सांगितले… त्यातील मुख्य फकीर जो आहे… असद अली खां, त्याची क्रुपा झाली तर ती तुला आयुष्यभर कामाला येईल.
खांसाहेबांकडुन गाणे शिकायचे होते. त्यासाठी त्यांना राजी करणे महत्त्वाचे. मामाने सांगितले… टोपलीभर गुलाबाची फुले आणि मिठाई घेऊन खांसाहेबांकडे जा. सोबतीला थोडा चरस असेल तर उत्तम. त्यांचे पाय धर. विनंती कर. हट्ट कर. मग तुला ते गायन शिकवतील.
मामाने सांगितल्याप्रमाणे वसंतरावांनी फुले, मिठाई, आणि हो…. कुठुनतरी चरसही आणला. सर्व वस्तू खांसाहेबाना अर्पण केल्या. विनंती केली. खांसाहेबाना राजी केले.
खासाहेबांनी जवळ असलेल्या विहिरीकडे त्यांना नेले. दोघेही काठावर बसले. संध्याकाळची वेळ होती. वसंतरावांच्या हातात त्यांनी गंडा बांधला. गंडा बांधणे म्हणजे शिष्य या नात्याने गुरुशी नाते जोडणे. गंडा बांधून झाला. मग त्यांनी वसंतरावांना अर्धेकच्चे चणे खायला दिले. हाही एक त्या विधीचा भाग. असले चणे खाताना, चावताना त्रास होतो. कडकडा चावून खावे लागतात. विद्या मिळवण्याचा मार्ग कसा खडतर आहे हे कदाचित त्यातून सुचवायचे असेल. चणे खाऊन झाल्यावर एक लहानसा गुळाचा खडा तोंडात घातला. कानात कुठल्यातरी रागाचे सुर सांगितले.
तालमीला सुरुवात झाली. खांसाहेबांनी जवळच्या एका फकिराला इशारा करताच त्याने ‘मारवा’ आळवायला सुरुवात केली.
वसंतराव सांगतात, “विहीरीवर बसून गाण्यातली गोम अशी होती की काठावर गायलेला सुर विहिरीत घुमुन वर येत असे आणि तंबोर्याचा सुर मिळावा तसा सुर विहीरीतुन मिळत असे “.
सतत तीन महिने खांसाहेबांनी मारवा हा एकच राग शिकवला. वसंतराव म्हणतात की तो त्यांनी असा काही शिकवला की त्या एका रागातून सगळ्या रागांचे मला दर्शन झाले.
मारवा गळ्यात पक्का बसला. आता बाकी रागांचे काय? तशी त्यांनी विचारणाही केली. त्यावर खांसाहेब म्हणाले,
” जा. तु आता गवयी झालास. एक राग तुला आला… तुला सगळे संगीत आले”.
आणि शेवटी म्हणाले….
“एक साधे तो सब साधे…
सब साधे तो कुछ नही साधे “
वसंतराव देशपांडे शास्त्रीय संगीतातील उत्कृष्ट गायक आहेत पण ते उत्तम अभिनेते पण आहेत हे सर्वांना समजले केंव्हा? तर ‘कट्यार काळजात घुसली ‘हे नाटक रंगमंचावर आले तेव्हा. यातील ‘खांसाहेब’त्यांनी अजरामर केला. वास्तविक त्यापुर्वी त्यांनी पु. लं. च्या ‘तुका म्हणे आता’, ‘दूधभात’ या चित्रपटांतून कामे केली होती. पण ‘कट्यार… ‘मधील खांसाहेब ने त्यांना प्रसिध्दीच्या शिखरावर नेले.
या महान गायकाने उदरनिर्वाहासाठी, प्रपंच चालवण्यासाठी आयुष्यातील भर उमेदीची २४ वर्षे चक्क कारकुनी केली. रात्र रात्र मैफिली गाजवणारे वसंतराव सकाळ झाली की सायकलवर टांग टाकून मिलीटरी ऑफिसमध्ये खर्डेघाशी करायला जात. सदाशिव पेठेत असलेल्या एका खोलीत संसार. एक दोन नाही…. पंचवीस तीस वर्षं. त्यावेळी एका ज्योतीषाला त्यांनी कुंडली दाखवली होती. तो ज्योतिषी वसंतरावांना म्हणाला….
“वसंतराव.. मोठी खट्याळ कुंडली आहे तुमची. तुम्हाला आयुष्यात धन, पैसा, प्रतिष्ठा, सन्मान सर्व काही लाभणार आहे. खडिसाखरेचे ढीग तुमच्या पुढे पडणार आहे. पण अश्यावेळी की त्याचा आस्वाद घ्यायला तुमच्या मुखात दात नसतील”.
त्या ज्योतीष्याकडे पहात मिस्कील स्वरात वसंतराव म्हणाले…
“ठिक आहे. दात नसले तरी हरकत नाही. आम्ही ती खडीसाखर चघळून चघळून खाऊ”.
आयुष्यभर स्वरांचे वैभव मोत्यांसारखे उधळले वसंतरावांनी. सुबत्ता, मानसन्मान, पुरस्कार आयुष्याच्या उत्तरार्धात मिळु लागले. पण फार काळ नाही. निव्रुत्त होण्यासाठी थोडे दिवस राहिले असतानाच संरक्षण खात्याने त्यांची बदली ईशान्येकडील नेफाच्या जंगलात केली. जंगलातील तंबूत त्यांचे वास्तव्य. पाऊस पाणी, रोग राई, जीवजंतू याचा विपरीत परिणाम त्यांच्या प्रक्रुतिवर झाला. तेथून ते परतले. निव्रुत्त झाले. पण तेथे जडलेली पोटाची व्यथा त्यांना त्रास देऊ लागली.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात त्यांचा एकसष्ठीचा सत्कार झाला. त्यानंतर पुढच्याच वर्षी वयाच्या… बासष्ठाव्या वर्षी अकोला येथे झालेल्या बासष्ठाव्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. आणि वर्षभरातच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
आज २ मे. वसंतरावांचा जन्मदिवस. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
आपली भारतीय संस्कृती ही अतिशय वैविध्यपूर्ण असल्याने ती मनामध्ये रुजून बसते. ह्या विविधतेमध्ये सणसमारंभ, राहणीमान, नात्यांमधील गोडवा हा तर जास्त मोहवून टाकतो.
भारतीय व्यक्ती ही मुळात कुटुंबप्रिय, माणसांची आवड असणारी, मनापासून माणसं जपणारी आणि रक्ताच्या नात्याइतकच मनाच्या नात्यालाही तोलून धरणारी असते. जवळपास प्रत्येक व्यक्ती ही आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर निरनिराळ्या नात्यांमध्ये समरस होत असते. जन्मापासून मिळतात ती रक्ताची नाती, विवाह नंतर जुळतात ती जरी रक्ताची नाती नसली तरी घट्ट धरून ठेवावी अशी नाती आणि ह्या नातेसंबंधाना जोडून ठेवणारा भक्कम पिलरचे काम करणारी मध्यस्थ व्यक्ती आणि जीवनाच्या प्रवाहात अगदीं लहानपणापासून ते वयाचे कुठलेही बंधन नसलेले मैत्रीचे आणि मनापासून मनाने जोडलेली अनमोल नाती.
पाश्चिमात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृती ह्यामध्ये प्रामुख्याने फरक भारतीय संस्कृतीत हमखास असणाऱ्या नाते संबंध आणि त्यासाठीच्या जपणुकीसाठी असोशीने केल्या जाणाऱ्या प्रयत्ना मध्ये असतो. पाश्चिमात्य संस्कृतीत सगळी नाती ही जवळपास एकाच साच्यात असतात. आपल्या सारखी विविधता तेथे नसते, आपली मंडळी ही आपल्याशी कुणी काकाकाकू, मामामामी, मावशी, आत्या आणि त्याचप्रमाणे ह्या नात्यातून निर्माण झालेली वेगवेगळ्या प्रकारची भावंडं आयुष्यात लज्जत आणतात नाही तर पाश्चिमात्य संस्कृती मध्ये मात्र “सब घोडे बारा टके” ह्या म्हणी नुसार सगळी नाती सरसकट आण्टी, अंकल मध्ये घुसळलेली.
आपल्या पिढीला सगळी नाती माहीत झाली, अनुभवायला मिळाली मात्र आजकाल काळानुरूप घेतल्या जाणाऱ्या “हम दो हमारा एक” ह्या म्हणीनुसार काही नाती ह्या हल्लीच्या मुलांना अनुभवायला मिळतच नाही, असो पण आपण अनुभवलेल्या नात्यांमध्ये खूप जास्त वेगवेगळा आनंद देणारी निरनिराळी नाती होती, आत्या ,मामा, मावशी, काका, काकू, ह्या अनुषंगाने मैत्र जुळलेली भावंडं ह्यामुळे आपण समृध्द होतो, पश्चिमात्य संस्कृती सारखे आंटी अंकल ह्या एकाच बासनात गुंडाळलेली नाती नव्हती. शिवाय छान लेक जावई, मुलगा सून ही अत्यानंद देणारी नाती आपण कधीच ” इन लॉ” च्या चौकटीत बंदिस्त करत नाही.
खरंच प्रत्येक नात्याची जागा वेगळी, स्थान वेगळं, लज्जत, गोडी आणि खुमारीच वेगळी. परवा अनुभवलेला एक प्रसंग सांगून पोस्ट लांबण न लावता जरा आवरती घेते. परवा एका परिचित कौटुंबिक स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाला जायचा योग आला. तेव्हा तेथील एक स्त्री एका तरुण नवविवाहित तरुणीची ही “माझी लेक” असं म्हणून ओळख करुन देत होती. माझ्या माहिती प्रमाणे त्या स्त्री ला एकुलता एक मुलगा होता, नंतर कळले ती सुनेला मुलीसारखी मानून तिची लेक म्हणून ओळख करुन देत होती. ह्याकडे मी जरा वेगळ्या नजरेने बघितल्यावर मला प्रकर्षाने जाणवले, प्रत्येक नात्याचे स्थान, ते नात, त्यातील लज्जत ही वेगवेगळी असते, शिवाय सासू सुनेचे नाते हे सुध्दा एक खूप सुंदर असं नातं असतं, आजकाल तर आपल्या परिचित लोकांकडे सासुरवास हा शब्द औषधाला सुद्धा सापडत नाही, मग हे सुंदर नविन निर्माण झालेले अलवार नाते फुलवण्यासाठी त्याला लेकीची भूमिका देऊन ती सगळ्यांना सांगत सुटणं, खरंच आवश्यक असतं काय ?
सासुसूनेचे नाते हे सुध्धा मायलेकीच्या नात्या प्रमाणेच एक सुंदर नात असतं फक्त त्याचा प्रकार वेगळा असतो हे मी आता माझ्या आणि आमच्या आईंच्या सलग बत्तीस वर्ष एकत्र घालविण्यानंतर ठामपणें सांगू शकते आणि तेच नात माझ्या नविन आलेल्या सूनेबरोबरही तयार होईलच ह्याची खात्री पण नक्कीच देऊ शकते.
त्यामुळे हा नात्यांचा विषय मांडताना मला हे प्रकर्षाने जाणवलं की प्रत्येक नात्याला आपल्या त्याच्या मुळ जागी ठेऊन त्याच्यातील सौंदर्य टीपाव आणि त्याचा आस्वाद ही घ्यावा. कुठल्याही नात्याला त्याचा ओरिजनल स्वाद घालवून मोल्ड करणे कितपत बरोबर, शिवाय हे मोल्डेड नाते पत शेवटपर्यंत बदललेल्या रुपात टीकेलच ह्याची पण काय निश्चिती ?,अर्थात हे माझे वैयक्तिक मत बर का.
☆ दे डाय रिच ! – लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ श्री सुनील देशपांडे☆
(नकोशा मालमत्ता)…
एकीकडे तरुण पिढी स्थावर मालमत्तांपासून दूर चालली आहे, तर दुसरीकडे ज्येष्ठ अजूनही स्थावर मालमत्तामध्ये मनाने गुंतून पडलेले आहेत.
फक्त स्वत:साठीच राहायला घर नव्हे, तर आपल्या मुलांसाठीसुद्धा घरे ज्येष्ठांनी घेऊन ठेवली आहेत.
ज्यांची पुढची पिढी महाराष्ट्राच्याही बाहेर नव्हे तर परराष्ट्रात आहे, अशांसाठीसुद्धा पालकांनी आपल्या आयुष्यातील पै-पै जमवून घरे घेतली आहेत.
त्यांच्यापुढील पिढय़ांना या घरांमध्ये काडीचाही रस नाही. या मालमत्तांकडे बघण्यासाठी वेळ नाही. पुढची पिढी खूप व्यवहारी आहे.
माझे एक अशील वयाच्या पंचाऐंशीव्या वर्षी वारले. पत्नीचे आधीच निधन झाले होते. एक मुलगा लंडनमध्ये आणि दुसरा न्यूझीलंडमध्ये रहातो. त्यांचे त्या देशाचे राष्ट्रीयत्व आहे. दोघांनाही वडिलांनी घेतलेल्या घरामध्ये स्वारस्य नव्हते. वडिलांनी इच्छापत्रानुसार सर्व मालमत्ता दोन्ही मुलांत समप्रमाणात देण्याचे लिहून ठेवले होते. मी इच्छापत्रानुसार व्यवस्थापक होतो. दोन्ही मुलांना सर्व मालमत्ता आपल्या नावावर करून घेण्यास, नंतर विकण्यास वेळ नव्हता. दोघांनी माझ्या नावाने कुलमुखत्यार पत्र (पॉवर ऑफ अॅटर्नी) बनवून दिले. सर्व मालमत्ता विकून येणारे पैसे विशिष्ट खात्यात जमा करून त्यांच्या देशात पाठवण्यास सांगितले.
ज्येष्ठ नागरिक आपल्या वास्तूंमध्ये भावनात्मकदृष्टय़ा गुंतलेले असतात, तशी तरुण पिढी नसते.
एका क्लाएंटने त्यांच्या निवृत्तीपश्चात राहण्यासाठी कोकणात घर बांधले होते. आई-वडिलांच्या पश्चात त्या मालमत्तेच्या सात/बारा उताऱ्यावर नावे लावण्यास मुलांना वेळ नव्हता. खेडय़ात जाऊन सरकारी अधिकाऱ्यांबरोबर कागदपत्रांची पूर्तता करणे कटकटीचे वाटत होते. हे सोपस्कार करून मिळणाऱ्या पशांमध्ये रस नव्हता. कारण त्यांचे उत्पन्न भरपूर होते. म्हणून वडिलांनाच त्यांच्या पश्चात, कोठे आड जागी घर बांधले म्हणून दूषणे देत होते.
आपली पारंपरिक दुसरी गुंतवणूक सोने-नाणे आणि चांदीच्या वस्तूंमध्ये असते. आणि ती सांभाळणे जोखमीचे असल्याने ती बँकेच्या लॉकरमध्ये ठेवली जाते. बँकेत ठेवल्याने त्याचा वापर संपतो आणि लॉकरचे भाडे व लॉकरसाठी द्यावी लागणारी ठेव रक्कम यांनी आपण बँकेला श्रीमंत करत असतो.
आमच्या लहानपणी सोन्याचा भाव अमुक होता. आज तो इतका वाढला, असे आपण म्हणतो. आपण मधली वर्षे मोजत नाही. सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये दीर्घ मुदतीत परतावा फक्त सात टक्के असतो. वस्तू घडणावळ आणि वस्तू मोडताना होणारी घट विचारात घेतल्यास तो अजून कमी होतो.
तसेच होणाऱ्या नफ्यावर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो तो वेगळाच.
सोन्या-चांदीतली गुंतवणूक ही खूपदा भावनात्मक जास्त असते. त्याचा व्यावहारिक विचार केला जात नाही.
मग सोने घेताना शुद्ध सोने घेऊन ठेवण्याऐवजी मुली-सुनांसाठी दागिने किंवा नातवंडांसाठी दागिने या स्वरूपात केली जाते.
खूपदा जुन्या पद्धतीचे दागिने नवीन पिढीस आवडत नाहीत. मग ते मोडून नवीन डिझाइनचे बनविले जातात. यात पुन्हा घट आणि घडणावळ जाते.
आज बाजारांत फेरफटका मारल्यास सर्वात जास्त दुकाने मोबाइलची नंतर सोने-चांदी, कपडेलत्ते, ओषधे, खाण्याचे पदार्थ यांची असतात. त्या तुलनेत वाणसामानाची फार कमी असतात. ज्यात नफा प्रचंड ती दुकाने जास्त. स्वाभाविकपणे त्यात ग्राहकाचा फायदा कमीच होणार.
नवीन पिढी जोखीम नको म्हणून खरे दागिने घालण्यापेक्षा खोटे घालणे पसंत करते. शेवटी खोटे जास्तच चकाकते. 😀
सोन्याची मागणी चीन आणि भारत देशात सर्वात जास्त आहे. इतर देशांत सोने दागिन्यांच्या स्वरूपात फार थोडय़ा प्रमाणात खरेदी केले जाते.
गुंतवणूक म्हणून इतर देशांत सोने शुद्ध स्वरूपात बाळगले जाते. बाजारातील सोन्याच्या भावातील चढ उतारानुसार त्याची खरेदी-विक्री केली जाते.
गुंतवणुकीच्या संकल्पना बदलत चालल्या आहेत. जुन्या योजनांचा परतावा पुढील काळात अजून कमी होण्याची शक्यता आहे. तो वेळीच समजून घ्या व पर्यायी गुंतवणूक योजना निवडणे क्रमप्राप्त ठरेल.
तिसरी भावनात्मक गुंतवणूक मुलांचे उच्चशिक्षण.
मुलांच्या उच्चशिक्षणासाठी आपल्या हौस-मौजेवर काट मारून प्रसंगी कर्ज काढतात. मुलं नोकरीला लागली की ते कर्ज फेडतात. मुलं परदेशात असतील तर हे कर्ज खूपदा आई-वडीलच फेडतात. याच्या पुढे जाऊन काही ज्येष्ठ आपल्या नातवंडांसाठी शिक्षणाची सोय म्हणून आयुर्वमिा पॉलिसी किंवा इतर गुंतवणूक करत असतात.
असेच एका ज्येष्ठ क्लाएंटला गुंतवणूक करताना विचारले,
‘‘काका, मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढले. आता नातवासाठी गुंतवणूक का करता?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस खूप वाढतोय. तेवढीच नातवाच्या शिक्षणासाठी माझी थोडीशी मदत.’’
मी त्यांना म्हटले, ‘‘नातवाच्या शिक्षणासाठी गरज किती रकमेची असेल, याचा अंदाज आहे का? आणि तुमच्या मुलाने नातवाच्या शिक्षणासाठी यापूर्वीच ‘एसआयपी’ गुंतवणूक सुरू केली आहे. ती रक्कम त्याच्या शिक्षणासाठी भरपूर होईल.
नातवाच्या नावाने लाखभर रुपये ठेवण्यापेक्षा तुम्ही दोघे चांगल्या पर्यटनाला जाऊन या.’’
त्यावर ते म्हणाले, ‘‘ही रक्कम नातवाच्या वाढदिवसाची भेट म्हणून आता तरी गुंतवा. नंतरच्या वेळचे नंतर पाहू.’’
आपली मानसिकता कशी आहे. आपल्याला मुलांकडून पसे घ्यायला त्यातसुद्धा लग्न झालेल्या मुलीकडून पसे घ्यायला कमीपणा वाटतो. पण नातवंडांची सोय पाहणे जबाबदारीचे वाटते.
आयुष्यभर मुलांचा विचार केला आणि म्हातारपणी नातवंडांचा विचार करता.
आपले आयुर्मान वाढते आहे. आपले खर्च वाढते आहेत. याचा विचार करा. कायम दुसऱ्यांचा विचार करण्यात स्वत:ची हौस-मौज विसरू नका. आयुष्य स्वत:साठी जगा.
असे म्हणतात की *भारतीय लोक आयुष्यभर गरिबीत (कष्टांत) राहतात आणि पुढल्या पिढीला श्रीमंत करतात..
१ मे १९६० रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते नवनिर्मित महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या चळवळीत पत्रकार, राजकारणी, लेखक आणि विचारवंत यांनी सहभाग घेतला होता. नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०५ जणांनी आपले बलिदान दिले.
२१ नोव्हेंबर,१९५६ या तारखेची ती संध्याकाळ होती. सकाळपासून फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने पेटून उठली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून त्याचा जळजळीत निषेध होत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगार आणि पांढरपेशांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता. दुपार नंतर, म्हणजे मुंबईतल्या शंभर-सव्वाशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चा निघेल, असा अंदाज होता. पण त्याला छेद देत पांढरपेशांचा प्रचंड जनसमुदाय, एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमू लागला. हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळला जाईल, असा अंदाज होता. कारण फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी केली होती. सर्व कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी पाठविले होते. जमावबंदीचा भंग करून, मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यानंतर थोड्या वेळातच विपरीत घडले. सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात आला. मात्र, तरीही ते चौकातून हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे “दिसताक्षणी गोळ्या” घालण्याचे पोलिसांना आदेश होते.
या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे काँग्रेसी सरकारला नमते घेऊन १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली. त्यानंतर १९६५ मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी झाली.
संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचे स्वप्न साकार झाल्यानंतर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी १ मे या दिवसाला ‘सोन्याचा दिवस’ असे संबोधले होते. संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलले होते, की ‘महाराष्ट्राच्या निर्मितीमुळे आपल्याला भरभराटीचे आणि सुखाचे दिवस येणार असून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे, हा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने मी माझे कर्तव्य समजतो. मराठी भाषिक प्रदेश एकत्र करून जनताभिमुख सरकार देणे, हे महाराष्ट्र राज्य स्थापनेमागील मुख्य धोरण आहे, हे सर्वांनी आपल्या मनावर कोरून ठेवावे.`
१ मे १९६० हा मराठी भाषिकांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस, या दिवशी यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या मंत्रिमंडळाने नवराज्याचा राज्यकारभार हाती घेतला. महाराष्ट्रातील लोक कोणत्या भागात राहत आहेत, त्यांची भाषा काय, त्यांचा धर्म, जात, पंथ कोणता, अशा विचाराला थारा न देता सर्वांना समान न्याय व समान संधी प्राप्त करून देणे, ही सरकारची मुख्य भूमिका असेल. केवळ मराठी बोलणाराच महाराष्ट्रीय नसेल तर जो महाराष्ट्रात राहून आपले जीवनमान समृद्ध करतो. असा प्रत्येक माणूस हा महाराष्ट्रीय असल्याचे मानले तरच महाराष्ट्र हे सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असल्याचे राज्य असेल, असेही ते म्हणाले होते.
वेगवेगळ्या कवींनी महाराष्ट्र गीते लिहिली आहेत.
गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी )>> मंगल देशा,पवित्र देशा,महाराष्ट्र देशा
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर >> बहू असोत सुंदर संपन्न की महा
राजा बढे >>जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला.
जुनी इंग्लिश नवे बदलून मूळ नावे पुन्हा प्रस्थापित करण्यात आली.भारतातल्या बऱ्याच शहरांची नावे दुरुस्त केली
मद्रासचे> चेन्न्नई< झाले
कलकत्याचे>कोलकाता< झाले
कोचीनचे > कोची< झाले
उटीचे > उधगमंडलम<झाले.
बेंगलोरचे > बंगळुरू < झाले
बेळगावचे >बेळगावी<झाले
बॉम्बे चे मुंबई केले आहे. परंतु परभाषीक महाराष्ट्रीयन हा आजही आवर्जून बॉम्बे च म्हणताना दिसतो. आपल्याला कोणी असे बॉम्बे म्हणताना आढळले तर त्या व्यक्तीला तिथेच थांबवून मुंबई म्हणायला भाग पाडले पाहिजे.असे करायला लावणारा तोच मराठी माणूस.आणि तीच त्या १०५ हुतात्म्यांना आदरांजली.
संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली होती. एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, नाना पाटील, तुळशीदास जाधव, डॉ. धनंजय गाडगीळ, भाऊसाहेब हिरे, आचार्य अत्रे, प्रो. मधु दंडवते इत्यादी अनेक व्यक्तींनी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी मोलाचे योगदान दिले. या महान व्यक्तींचे आपण सदैव ऋणी राहूया.
(पूर्वसूत्र – भोवतालच्या मीट्ट काळोखातही मनातला श्रद्धेचा धागा बाबांनी घट्ट धरून ठेवला होता. कांहीही करून हरवलेल्या त्या पादुका घरी परत याव्यात एवढीच त्यांची इच्छा होती. पण ती फलद्रूप होण्यासाठी कांहीतरी चमत्कार घडणं आवश्यक होतं आणि एक दिवस अचानक,..?)
पुढे एक दोन दिवसांनी बाबा पोस्टातून घरी आले ते आठ दिवसांची रजा मंजूर करून घेतल्याचे सांगतच.
” मी गाणगापूरला जाऊन येईन म्हणतो”
” असं मधेच?”
” हो.तिथे जाऊन पादुकांचे दर्शन घेतो. नाक घासून क्षमा मागतो. तरच माझ्या मनाला स्वस्थता वाटेल.”
ते बोलले ते खरंच होतं गाणगापूरला जाण्यासाठी त्यांनी घर सोडलं त्याच दिवशी घरातलं फरशा बसवण्याचं काम पूर्ण करून गवंडी माणसं शेजारच्या घरी त्याच कामासाठी गेलेली होती. बाबा परत आले ते अतिशय उल्हसित मनानंच! त्यांच्या चेहऱ्यावर एवढ्या दूरवरचा प्रवास करून आल्याचा किंवा जागरणाच्या थकावटीचा लवलेशही नव्हता.आत येताच पाय धुवून त्यांनी स्वतःच देवापुढे निरांजन लावलं.मग कोटाच्या खिशातून एक पुरचुंडी काढली. ती अलगद उघडून देवापुढे ठेवली. त्यावर कोयरीतलं हळद-कुंकू वाहून नमस्कार केला.
“काय आहे हो हे?काय करताय?”आईने विचारलं.
” हा दत्तमहाराजांनी दिलेला प्रसाद.” ते प्रसन्नचित्ताने हसत म्हणाले.
“म्हणजे हो..?”
“मी संगमावर स्नान करून वर आलो आणि वाळूतून चालताना सहज समोर लक्ष जाताच एकदम थबकलो. समोर सूर्यप्रकाशात काहीतरी चमकत होतं. मी जवळ जाऊन खाली वाकून ते उचलून घेतलं. पाहिलं तर तो वाळूत पडलेला हुबेहूब पादुकेसारखा दिसणारा गारेचा एक तुकडा होता.पण ही अशी एकच पादुका घरी कशी आणायची असं मनात आलं.काय करावं सुचेचना. मग सरळ मागचा पुढचा विचार न करता तिच्यासोबत हा दुसरा तेवढ्याच आकाराचा लांबट गारेचा खडा उचलून आणला…”ते उत्साहाने सांगत होते.हे वाचताना त्यांनी दुधाची तहान ताकावर भागवून घेतली असं वाटेलही कदाचित,पण ते तेवढंच नव्हतं हे कांही काळानंतर आश्चर्यकारक रितीने प्रत्ययाला आलं.तोवर तत्काळ झालेला एक बदल म्हणजे त्यानंतर घरातलं वातावरण हळूहळू पूर्वीसारखं झालं. यामधेही चमत्कारापेक्षा मानसिक समाधानाचा भाग होताच पण हे सगळं पुढे चमत्कार घडायला निमित्त ठरलं एवढं मात्र खरं!
आमच्या घरात फरशा बसवून झाल्यानंतरचा अंगणात रचून ठेवलेला फुटक्या शहाबादी फरश्यांच्या तुकड्यांचा ढीग अद्याप मजूरांनी हलवलेला नव्हता. त्यातल्याच एका आयताकृती फरशीच्या तुकड्यावर त्या गारेच्या दोन पादुका शेजारच्या घरी काम करत असलेल्या गवंडी मजुरांकडून बाबांनी सिमेंटमधे घट्ट बसवून घेतल्या. आश्चर्य हे की तेच मजुर त्या संध्याकाळी कामावरून घरी जाण्यापूर्वी आपणहून आमच्या घरी आले. बाबांना विचारुन त्यांनी त्या ढीगातले त्यातल्या त्यात मोठे चौकोनी तुकडे शोधून त्या पादुका ठेवायला एक कट्टा आणि त्या भोवती तिन्ही बाजूंनी आणि वर बंदिस्त आडोसा असं जणू छोटं देऊळच स्वखुशीने बांधून दिलं! त्या कष्टकऱ्यांना ही प्रेरणा कुणी दिली हा प्रश्न त्या बालवयात मला पडला नव्हताच आणि आईबाबांपुरता तरी हा न पडलेला प्रश्न निरुत्तर नक्कीच नव्हता! आमच्या घरासमोरच्या अंगणातलं ते पादुकांचं मंदिर आजही मला लख्ख आठवतंय!
दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून आंघोळ आवरून बाबांनी मनःपूर्वक प्रार्थना करून त्या पादुकांची तिथे स्वतःच प्रतिष्ठापना केली आणि त्यांची ते स्वत: नित्यपूजाही करु लागले.हे सुरुवातीला निर्विघ्नपणे सुरु राहिलं खरं पण एक दिवस बाबांना अचानक पहाटेच फोनच्या ड्युटीवर जाण्याचा अनपेक्षित निरोप आला. परत येऊन अंघोळ पूजा करायची असं ठरवून बाबा तातडीने पोस्टात गेले पण दुपारचे साडेअकरा वाजत आले तरी ते परत आलेच नाहीत.आज पादुकांची पूजा अंतरणार या विचाराने आई अस्वस्थ झाली. आम्ही भावंडांनी आपापली दप्तरं भरून ठेवली.आईनं हाक मारली की जेवायला जायचं न् मग शाळेत.आईची हाक येताच आम्ही आत आलो.आई आमची पानंच घेत होती पण नेहमीसारखी हसतमुख दिसत नव्हती.
“आई, काय झालं गं?तुला बरं वाटतं नाहीये का?” मी विचारलं.आई म्लानसं हसली.तिच्या मनातली व्यथा तिने बोलून दाखवली.यात एवढं नाराज होण्यासारखं काय आहे मला समजेचना.
“आई, त्यात काय?आमच्या मुंजी झाल्यात ना आता?मग आम्ही पूजा केली म्हणून काय बिघडणाराय?खरंच..,आई, मी करू का पादुकांची पूजा?” मी विचारलं.आई माझ्याकडे आश्चर्याने बघतच राहिली.
” नीट करशील?जमेल तुला?”
” होs.न जमायला काय झालं? करु?”
“शाळेला उशीर नाही का होणार?”
“नाही होणार.बघच तू”
“बरं कर”आई म्हणाली.
त्यादिवशी पुन्हा आंघोळ करून आणि पादुकांची पूजा करून घाईघाईने दोन घास कसेबसे खाऊन मी पळत जाऊन वेळेत शाळेत पोचलो. दत्तसेवेच्या मार्गावरचं माझ्याही नकळत आपसूक पुढे पडलेलं माझं ते पहिलं पाऊल होतं! पुढे मग बाबांना खूप गडबड असेल, वेळ नसेल, तेव्हा पादुकांची पूजा मी करायची हे ठरुनच गेलं.
काही महिने असेच उलटले.सगळं विनासायास आनंदाने सुरु होतं.आणि एक दिवस मी पूजा करत असताना अचानक माझ्या लक्षात आलं, की त्यातल्या पादुकेच्या शेजारच्या गारेच्या दुसऱ्या लांबट तुकड्यालाही हळूहळू पादुकेसारखा आकार यायला लागलाय.
त्याच दरम्यान त्या छोट्याशा देवळावर सावली धरण्यासाठीच जणूकांही उगवलंय असं वाटावं असं देवळालगत बरोबर मागच्या बाजूला औदुंबराचं एक रोप तरारून वर येऊ लागलं होतं!!
ते रोप हळूहळू मोठं होईपर्यंत कांही दिवसातच त्या गारेच्या लांबट दगडाला त्याच्यासोबतच्या पादुकेसारखाच हुबेहूब आकार आलेला होता!!
आईबाबांच्या दृष्टीने हे शुभसंकेतच होते. हळूहळू ही गोष्ट षटकर्णी झाली तसे अनेकजण हे आश्चर्य पहायला येऊ लागल्याचं मला आजही आठवतंय.
कुरुंदवाड सोडण्यापूर्वीच बाबांना वाचासिद्धीची चाहूल लागलेली होती तरीही आम्हा मुलांच्या कानापर्यंत त्यातलं काहीही तोवर आलेलं नव्हतं.पण खूपजण काही बाही प्रश्न घेऊन बाबाकडे येतात ,मनातल्या शंका बाबांना विचारतात, बाबा त्यांचं शंकानिरसन करायचा प्रयत्न करतात आणि ते सांगतात ते खरं होतं हे येणाऱ्यांच्या बोलण्यातून अर्धवट का होईना आमच्यापर्यंत पोचलो होतंच.
संकटनिवारण झाल्याच्या समाधानात ती माणसं पेढे घेऊन आमच्या घरी यायची. बाबांचे पाय धरू लागायची पण बाबा त्यांना थोपवायचे. ‘नको’ म्हणायचे. नमस्कार करू द्यायचे नाहीत.पेढेही घ्यायचे नाहीत.
“अहो, मी तुमच्या सारखाच एक सामान्य माणूस आहे. मला खरंच नमस्कार नका करु. तुमच्या देव मी नाहीय.मी हाडामासाचा साधा माणूस.तुमचा देव तो.., तिथं बाहेर आहे. त्याला नमस्कार करा. यातला एक पेढा तिथं,त्याच्यासमोर ठेवा आणि बाकीचे त्याचा प्रसाद म्हणून घरी घेऊन जा” ते अतिशय शांतपणे पण अधिकारवाणीने सांगायचे.
तो बाहेर देवापुढे ठेवलेला पेढाही आम्ही कुणीच घरी खायचा नाही अशी बाबांची सक्त ताकीद असे. त्या दिवशी कोणत्याही निमित्ताने जो कुणी आपल्या घरी येईल,त्याला तो पेढा प्रसाद म्हणून द्यायचा असं बाबांनी सांगूनच ठेवलं होतं. मग कधी तो प्रसाद दुधोंडीहून डोईवरच्या पाटीत दुधाच्या कासंड्या घेऊन घरी दुधाचा रतीब घालायला येणाऱ्या दूधवाल्या आजींना मिळायचा, तर कधी आम्हा भावंडांबरोबर खेळायला, अभ्यासाला आलेल्या आमच्या एखाद्या मित्राला किंवा पत्र टाकायला घरी येणाऱ्या पोस्टमनलाही त्यातला वाटा मिळायचा!
माझे आई बाबा तेव्हाच नव्हे तर अखेरपर्यंत निष्कांचनच होते. त्यांच्या संसारात आर्थिक विवंचना,ओढग्रस्तता तर कायमचीच असे. पण तरीही बाबांनी लोकांच्या मनातल्या त्यांच्याबद्दलच्या विश्वासाचा कधीच बाजार मांडला नाही. ते समाधानीवृत्तीचे होतेच आणि सुखी व्हायचे कोणतेच सोपे जवळचे मार्ग त्यांनी जवळ केले नव्हते. देवावरची आम्हा मुलांच्या मनातली श्रद्धासुद्धा तशीच निखळ रहाणं आणि आमच्या मनात अंधश्रद्धेचे तण कधीच न रुजू देणं ही माझ्या आई-बाबांनी आम्हा भावंडांना दिलेली अतिशय मोलाची देनच म्हणावी लागेल!
पं भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर या दोन भारतरत्नांनी गायिलेले ‘ गुणगान करिये रामका ‘ हे अतिशय सुंदर गीत. हे गीत ऐकताना जणू समाधी लागते. तशी रामाची कुठलीही गाणी गोडच ! मग ते गीतरामायण असो वा अन्य कुठलीही गाणी. मुळात रामायणच गोड ! पेढ्याचा कुठलाही भाग खाल्ला तरी तो गोडच लागणार ना ! तशीच अवीट गोडीची ही रामकथा. या रामकथेने हजारो वर्षांपासून अनेकांना प्रेरणा दिली. शेकडो लेखक आणि हजारो कवी लिहिते झाले. पण रामकथेची थोरवी संपली का ? वर्णन करून झाली का ? ती कधीच संपणार नाही. रामकथा म्हणजे विविध डोळे दिपविणाऱ्या रत्नांनी भरलेला एक सागर आहे. जेवढी खोल बुडी माराल तेवढी रत्ने हाताला लागतील. समुद्राला आपण रत्नाकर म्हणतो. रामकथा सुद्धा या अर्थाने एक रत्नाकरच !
मी सुरुवातीला उल्लेख केलेल्या गीताचे सुरुवातीचे शब्द आहेत ‘ रामका गुणगान करिये.’ रामाचं गुणगान कशाकरता करायचं ? आणि गुणगान केलं तरी कोणाचं जातं ? ज्याच्यात काही अलौकिक असे गुण आहेत, अशाच व्यक्तीचं आपण गुणगान करतो ना ! आपण रामाचं गुणगान करतो, कृष्णाचं गुणगान करतो, शिवाजी महाराजांचं गुणगान करतो, ते त्यांच्यात विशेष असे अलौकिक गुण आहेत म्हणून. आपण रावणाचं, कंसाचं, औरंगजेबाचं गुणगान करत नाही. आपण आपल्यासमोर असेच आदर्श ठेवतो की ज्यांच्यापासून आपल्याला काही शिकता येईल, प्रेरणा घेता येईल. आजच्या या लेखात प्रभू श्रीरामांचे असेच काही गुण आठवू या. त्या निमित्ताने त्यांचं गुणगान करू या.
सुरुवातीला मला डोळ्यासमोर दिसतो तो, वसिष्ठांच्या आश्रमात शिकणारा राम. राम राजपुत्र असला तरी, आश्रमात तो एक वसिष्ठ ऋषींचा आज्ञाधारक शिष्य म्हणूनच वावरतो. इतर शिष्यांबरोबरच आश्रमातील सगळी कामे करतो, नियम पाळतो. इतर विद्यार्थी जे काही अन्न ग्रहण करतील तेच अन्न तोही ग्रहण करतो. कुठेही राजपुत्र असल्याचा तोरा तो मिरवत नाही. आश्रमातील शिक्षण पूर्ण झाल्यावर निघताना वसिष्ठ ऋषींचा आणि गुरुमातेचा आशीर्वाद घेऊन तो निघतो. त्यावेळी गुरुमातेला तो म्हणतो, ‘ या आश्रमात तुम्ही आम्हाला मातेचे प्रेम दिले. मातेची आठवण येऊ दिली नाही. आमची पुत्रवत काळजी घेतली. या आश्रमातील वास्तव्यात माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर, आपण उदार मनाने मला क्षमा करावी. ‘ केवढा हा नम्रपणा !
आश्रमातील शिक्षण पूर्ण करून राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न आपल्या गृही परततात. आता खरे तर काही दिवस त्यांचे मौजमजेचे आणि विश्रांतीचे. पण अशातच विश्वामित्र ऋषी येतात. त्यांच्या यज्ञात राक्षस विघ्न आणतात म्हणून संरक्षणासाठी रामाला आपल्याबरोबर पाठवण्याची मागणी करतात. वसिष्ठ ऋषींच्या समजावण्यानंतर दशरथ राजा रामाला विश्वामित्रांसोबत पाठवतो. अशा वेळी राम आनंदाने त्यांच्याबरोबर जातो. सोबत लक्ष्मणही असतोच ! लक्ष्मण हा रामाची सावली आहे. सावली जशी आपली साथ सोडत नाही, तशीच लक्ष्मणही रामाची साथ कधीच सोडत नाही. विश्वामित्रांसोबत वनातून जात असताना राम आपल्या मधुर वाणीने आणि आज्ञाधारकतेने विश्वामित्रांचे मनही जिंकून घेतो. त्यांना म्हणतो, ‘ कदाचित माझ्या शिक्षणात काही अपूर्णता राहून गेली असावी. मला तुमच्याकडून काही नवीन शिकायला मिळावे म्हणूनच ही नियतीची योजना असावी. ‘ विश्वामित्र आपल्या या गोड आणि तेजस्वी शिष्यावर बेहद्द खुश होतात आणि राम लक्ष्मणाला काही दिव्य अस्त्रं बहाल करतात, जी त्यांना पुढील काळात उपयोगी पडतात. ‘
मग मला आठवतो तो राम की ज्याला राज्याभिषेक होणार असतो. खरं तर केवढा आनंदाचा हा प्रसंग ! आणि त्यानंतर लगेच कैकयी आपले दोन वर दशरथाकडून मागून घेते. एका वराने रामाला वनवासात पाठवावे आणि दुसऱ्या वराने भरताला राजा करावे. दोन्ही टोकाचे प्रसंग ! एक अति आनंदी होण्याचा, तर दुसरा अति दुःखी होण्याचा. पण या दोन्ही प्रसंगात रामाची स्थितप्रज्ञता आपल्याला दिसते. तो आनंदाने हुरळून जात नाही की वनात जावे लागेल म्हणून दुःखी होत नाही. कोणतीही परिस्थिती संयमाने कशी हाताळावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राम. म्हणूनच तो ‘ मर्यादापुरुषोत्तम ‘ आहे. त्याच्या वागण्याबोलण्यात सागराचे गांभीर्य आहे.
दशरथ राजामध्ये रामाला वनवासात जा म्हणून सांगण्याची हिंमत राहिलेली नसते. पण आपल्या पित्याने दिलेले वचन खोटे ठरू नये म्हणून तो आनंदाने वनवासाला जायला निघतो. खरं तर प्रजा त्याच्या बाजूनं असते. त्याने उठाव केला तरी प्रजेने त्याची साथ दिली असती एवढा तो प्रजेला प्रिय होता. पण रामाचा निर्धार, रामाचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. त्यात कालत्रयीही बदल होणार नाही. सीतेसारखी तरुण आणि त्रिभुवनात जिच्या सौंदर्याची कोणी बरोबरी करू शकणार अशी पत्नी. नुकताच विवाह पार पडलेला. अशा वेळी आपल्या तरुण आणि सुंदर पत्नीचा मोहही त्याला अडवू शकत नाही. सीता नंतर त्याच्यासोबत जाते हा भाग वेगळा.
कैकयीमुळे आपल्या प्राणप्रिय असलेल्या बंधूला वनात जावे लागते हे लक्ष्मणाला कळते, तेव्हा तो कैकयीची निर्भत्सना करतो. अशा वेळी राम त्याला सुंदर शब्दात समजावतो. ‘ लक्ष्मणा, अरे जशी माता कौसल्या, माता सुमित्रा तशीच माता कैकयी. माता ही सदैव आदरणीय असते. ‘ जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियासि ‘ हे त्याचे ब्रीद आहे. ‘ नाहीतरी मला काही ऋषीमुनींची भेट घ्यायची इच्छा आहे. वनात गेल्यानंतर अनायासे ही इच्छा पूर्ण होईल, ‘ असे अत्यंत समजूतदारपणा आणि त्याच्या मनाचे औदार्य दाखवणारे उद्गार तो काढतो.
वनात असतानाही भरत त्याला भेटायला येतो. अयोध्येला परत येण्यासाठी खूप विनवणी करतो. परंतु राम त्याला निर्धारपूर्वक नकार देतो. शेवटचे अस्त्र म्हणून तो वसिष्ठांची पण तशीच इच्छा आहे असे रामाला सांगतो. पण राम भरताला म्हणतो, ‘ एकदा आपण वडिलांना जे वचन दिले ते पाळले नाही तर रघुकुलाच्या कीर्तीला कलंक लागेल. ‘ ‘ रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई .’ हे ब्रीद कसोशीने पाळणारा राम आहे. या ठिकाणी दुसरा कोणीही असता तर भावाने विनंती केली, वसिष्ठांचीही तशीच इच्छा होती, असे सोयीस्कर उद्गार काढून अयोध्येला परत जाऊ शकला असता.
रामाने एकदा ज्याला आपले म्हटले, हृदयाशी धरले, त्याची साथ कधीच सोडली नाही. मग तो गुहक असेल, निषादराज असेल, सुग्रीव असेल किंवा बिभीषण असेल. शरणागताला आश्रय देणे, प्रसंगी आपल्या प्राणांचे मोल त्यासाठी द्यायला तयार होणे हे रामाचे ब्रीद होते. मित्र जोडताना जातपात, उच्चनीच, स्त्रीपुरुष असा भेद रामाने कधीच केला नाही. रामाने रावणावर विजय मिळवला, लंका जिंकली. ठरवले असते तर तो लंकेचा राजा होऊ शकला होता. पण तो मोह त्याला नव्हता. रावण जर रामाला शरण आला असता, तर रामाने त्याचेही मनपरिवर्तन केले असते. त्याचे राज्य त्याला परत दिले असते. पण तसे व्हायचे नव्हते. कोणी तरी रामाला विचारले, ‘ तुम्ही बिभीषणाला राज्य द्यायचे वचन दिले आणि ते त्याला दिले. पण जर रावण तुम्हाला शरण आला असता, आणि त्याने राज्याची मागणी केली असती तर काय ? ‘ अशा वेळी रामाने फार सुंदर उत्तर दिले आहे. तो म्हणतो, ‘ रावण माझ्याकडे आला असता तर, त्याला मी अयोध्येचे राज्य दिले असते आणि आम्ही चारही भाऊ अरण्यात निघून गेलो असतो. ‘ असे मनाचे औदार्य दाखवणारे उदगार फक्त रामच काढू शकतो. रावणाचा वध झाल्यानंतर त्याचा यथोचित अंत्यसंस्कार करावा असे तो बिभीषणाला सुचवतो. मृत्यूनंतर वैर संपते आणि त्याचा आदर्श रामाने घालून दिला.
रामाच्या चरित्रात असे त्याच्या गुणविशेष दर्शवणारे अनेक प्रसंग आहेत. महर्षी वाल्मिकींनी देखील श्रीरामाला देव म्हणून आपल्यासमोर ठेवले नाही. त्याच्या गुणांची पूजा आपण बांधावी, त्याचे अनुकरण करावे हाच त्यांचा उद्देश होता. समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे उद्गार काढले आहेत, तेच उद्गार तंतोतंत रामालाही लागू होतात. समर्थ म्हणतात
निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारु ।
अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी ।।
अशा या गुणनिधी असलेल्या रामाचे गुणगान करू या. त्याचे थोडे तरी गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न करू या. जय श्रीराम !
मनाच्या उंबरठ्यावर खूप गर्दी होती. मेघ दाटल्यासारखे मनातले आभाळ भरून आले होते. फक्त डोळ्यातून अश्रू वाहणे राहिले होते. नजर कोणत्याच नजरेला मिळालेली नव्हती. वीज जेव्हा क्षणार्धात धरणीचे चुंबन घेते. आणि क्षणातच तिच्या कवेतून पसार होते. अशी भेट बहुदा झाल्यानंतरच असवांची वाट मोकळी होणार होती.
मनातल्या दाटलेल्या आभाळाच्या मनात खूप काही लपून होतं. गरज होती आभाळ रितं होण्याची आणि मेघ अश्रू वाहण्याची. काळेभोर ढग का साटतात? कसे तरंगतात? हवे तिथे बरसतात का? की नको तेथे कोसळतात आणि कोसळेलच तर का ? असे प्रश्न माझ्या मनात का उपस्थित होतात. मला कळत नाही.
कुणाला काय घेणे, देणे त्या दाटलेल्या ढगांचे आणि वाहणा-या आसवांचे! तहानलेल्या भावनांची तहान आसवांनी मिटेल का ? की तहान भागवण्यासाठी किती वेदनांची दारे ठोठावयाची यालाही काही मर्यादा आहे की नाही? डोक्याला फेटा जितका वेळ राहतो, तेवढेच सुख वाटेला येते. फेटा उतरला की दु:ख पुन्हा सिंहासनावर येऊन बसते. सुख दु:खाच्या या लपंडावात किती बुध्दीबळाचे प्यादे, हत्ती, घोडे, उंट, वजीर मारले जातात. अखेर राजा ही चुकत नाही. कारण या डावात एक हारल्याशिवाय दुसरा जिंकणार कसा? एकाला हारावेच लागते हा नियमच आहे. किती नियमात राहू…की बरसून जाऊ मेघ होऊन एकदा त्या मुक्ततेने कोसळणा-या सरींसारखा! की वादळ होऊ आणि साठलेली काळजावरची धूळ उडवून टाकू! म्हणजे काळीज कसे आहे, हे तरी समजेल!
बरसल्यावर निदान मृदगंधातून तरी हृदयापर्यत पोहचता येईल. बाहेरून कसं ओळखायचं मन, की कोणत्या फोटोमध्ये किंवा कोणत्या सेल्फीमध्ये दिसेल हे मन! श्वासातून क्षणभर मनाला स्पर्श करून मृदगंधाला सोबत घेऊन, मनापर्यत पोहचून मनाशी हितगूज करून पुन्हा श्वासातून बाहेर येता तरी येईल. क्षणभर का होईना निखळ मनामनांची भेट होईल. शेवटी हा आभासचं!
आभाळ भरलेले असताना कबूतरांची जोडी खिडकीच्या आस-याखाली येवून बसताना दिसली. गुटरगुटर आवाज करत चोची जवळ चोच आणत जणू येणा-या संकटावर मात कसे करायचे? याचा विचार करत होते की काय? की सुटलेला गार वारा, मौसमातला थंडावा, ऋतूहळवा, प्रितीचा बहर, कुठेतरी पाऊस चालू असताना वा-या सोबत वाहणारा मृृदगंधचा स्वाद घेत प्रेमाचे संवाद करत असतील. याचा विचार माझ्या मनात येत होता. कोण आपल्याला पाहतं का? तसेतर वेळ्ला किती महत्व आहे आपल्याला माहीत आहे. मिळालेला वेळ ते हितगूज करण्यात घालवतात. एकमेकांना काय हवं काय को याची विचारपूस करतात हे काय कमी आहे का? या जिवंत उदाहरणाकडे मी एकटक पाहत बसलो होतो.
चहा मला करायला येतो. या वेळी घरात कोणीच नव्हतं. मी चहा बनवायला घेतला. मला चहा जास्त लागत नाही. मी अर्धा कपच चहा घेत असतो. तो माझ्या मनाप्रमाणे व्हावा हे अपेक्षित असतं. दूध थोडसं, चहा पावडर, चिमूटभर साखर सोबत आल्ह किसून टाकलं आणि उकळी येऊन दिली. चहा गाळून घेतला, चहाचा कप हातात घेऊन खिडकीतून त्या कबूतराच्या जोडीकडे बघत गालातल्या गालात हसत ऋतुराजाच्या या प्रेमळ देखाव्याच्या स्वागतासाठीच जणू मी सज्ज झालो होतो.
आता हा मेघराजा कसं बरसणार, हे दाटलेले आभाळ मोकळे होताना वीज कितीदा धरणीला चुंबनार, आणि कितीदा मखमली जखमा करून सोडून जाणार, या कबूतराची जोडी माझ्या खिडकीच्या आस-याला थांबणार, की अजून कोणता आसरा शोधणार, हा वादळवारा गारवा देणार की डोक्यावरचे छप्पर घेऊन जाणार हे शेवटी प्रश्न ते प्रश्नचं……..चहा संपला आणि शेवटी माझ्याकामाकडे मी वळालो….
किती प्रेम, किती जिव्हाळा आहे ना या शब्दामध्ये. ग. ह. पाटलांची ही कविता ऐकली की परत एकदा फिरून आजोळी जावसं वाटतं. आजोळ म्हणजे प्रत्येकाच्या आईचं माहेर. मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा शाळेला कधी एकदा सुट्टी लागते आणि आपण आजोळी जातो अशी ओढ या बाल मनाला लागलेली असते. ही ओढ अजोळामध्ये मिळणाऱ्या प्रेमामुळे, लाडामुळे, आपुलकीमुळे असते.
माझी मुले छोटी होती तेव्हाची एक गोष्ट आठवते. दोन्ही मुलं रोज शाळेला स्कूल बसने जायची. स्कूल बसमध्ये एक शाळेतलाच माणूस मुलांना सोडायला यायचा. शेवटच्या दिवशी त्याने माझ्या मुलांना विचारले,
“अरे बच्चों, इस बार कहॉं जानेवाले हो छुट्टीयोंमे?”
त्यावर माझ्या छोट्या मुलाने क्षणभरही विचार न करता पटकन उत्तर दिले होते,
“मायके”
सगळेजण त्याच्या उत्तराने हसू लागली आणि त्याला विचारू लागली,
“अरे, किसके मायके जाने वाले हो?”तेव्हा देखील तो धीटपणे म्हणाला.
“मम्मी के मायके जानेवाले हैं।”
तेव्हा तो अगदी छोटा होता. दुसरीच्या वर्गात. पण तेव्हा मुलांना माझ्यापेक्षाही आधी आजोळी जायची ओढ असायची.नातवाला आजोळ विषयी वाटणारी ओढ किती छान काव्यरूप केली आहे बघा ग. ह. पाटलांनी.
“कोण कानोसा घेऊन पाही हो
कोण लगबग धावून येई हो
गहिवरून धरून पोटी हो
माझे आजोबा चुंबन घेती हो
लेक एकुलती
नातू एकुलता
किती कौतुक कौतुक होई हो”
आजोळी इसाई देवीच्या यात्रेला जाताना,महानंदीने छान शाकारलेल्या, त्यावर ताडपत्रीचे छत घातलेल्या बैलगाडीला चंगाळ्या(पितळी घुंगरांच्या गळ्यात घातलेल्या माळा) गळ्यात घालून जेव्हा लाल्या- झुब्या जुंपले जायचे, तेव्हा त्यांच्या दुडक्या चालीने चालताना बैलगाडीमध्ये बसणाऱ्या माणसांना आणि मुलांना जी मजा यायची ती दुसऱ्या कुठल्याही गाडीमध्ये येणार नाही. यात्रेत जाऊन आजोबांच्या मागे लागून लागून प्रत्येक रहाट पाळण्यात बसायचे. आजोबांनी मात्र ‘जावयाचं पोरं’ म्हणून काळजीने आणि ‘लेकीचे लेकरू’ म्हणून दुधावरच्या साईच्या प्रेमाने त्याचे सगळे लाड पुरवायचे.
चिंचेच्या दिवसात अंगणात पन्नास पोते चिंच येऊन पडायची. ती फोडण्यासाठी अंगणभर छत केलं जायचं आणि सगळी गल्लीतील मुलं, मुली, बायका येऊन चिंचा फोडायला बसायचे. नातवांसाठी तर हे औषधचं. आजीच्या मागे लागून हळूच चिंचेचे चोकणे करून घ्यायचे. आईला नकळत गुपचूप ते गट्टम देखील करायचे.
आंब्याच्या दिवसातली मजा तर काही औरचं. आढीतले पिकलेले आंबे टोपलं भरून आजोबांनी काढून आणायचे. नातवांना अंगातले बनियन सुद्धा काढून टोपल्या भोवती बसवायचे आणि मग बाळकृष्ण जसा लोणी खाताना सगळ्या अंगावर लोणी सांडायचा तसे हे दोन नातू आंबे खाताना सगळ्या अंगावर आंब्याचा रस सांडायचे. काय गोड चित्र असायचं ते.
आमच्या आजोळची दिवाळी अजूनही आठवते. दिवाळीत जवळजवळ पन्नास माणसं आजोबांच्या घरात असायची. घरामध्ये सगळ्या आज्ज्या, माम्या, मावश्या, आई सर्वजण मिळून कामं करायची. पाहुणे आलेत म्हटलं की कुठे ऑर्डर द्यायला जायची वेळ यायची नाही. सगळ्याजणी मिळून साग्रसंगीत स्वयंपाक बनवायच्या. गोड पदार्थ करताना तर आजोबा स्वतः होऊन हातभार लावायचे.पन्नास माणसांसाठी फ्रुटसलाड केलेलं मला आठवतं एक मोठा पाण्याचा बंब भरून सर्व फळे, ड्रायफ्रूट्स एकत्र करून, दूध घालून हलवत असलेले आजोबा अजूनही आठवतात. चुलत, मावस, सख्खे असा काहीही भेदभाव तेव्हा नसायचा. सर्वजण एकत्र येऊन अगदी गुण्यागोविंदाने रहायचे. कारण घराची सत्ता ही एका कर्त्या पुरुषाकडेच असायची त्यामुळे घरे एकसंध होती. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहणाऱ्यांना आजोळचा आनंद माहिती असणार.
माझ्या आईच्या आजोळच्या आठवणी ती मला सांगते. तिच्या सगळ्या मावश्यांची मुलं, मामांची मुलं, आणि माझ्या आईची भावंड सगळी उन्हाळ्यात एकत्र आजोळी जायची. ती सर्व मिळून पंधरा वीस जण व्हायची. एवढ्यांना मेजवानी खाऊ घालण्यासाठी माझ्या आईचं आजोळ काही श्रीमंत नव्हतं पण प्रेमळ होतं. तिची आजी रोज सकाळी सकाळी गरम गरम वरण, भाकरी सगळ्या नातवंडांना खाऊ घालायची आणि आई सांगते, “आजीच्या हातची गरम गरम वरण भाकरी त्यासोबत एक लिंबाच्या लोणच्याची फोड आणि त्यानंतर वाचायला मिळणारा गावकरी हा पेपर म्हणजे आमच्यासाठी (आईसाठी) स्वर्गसुख होतं.” आजच्या काळातल्या मुलांना रूचेल का हो ही सुखाची कल्पना?
आम्ही आजोळी गेलो की सर्वांना मदत करू लागायचो. पडतील ती कामे करायचो. आताच्या पिढीच्या सुखाच्या कल्पनाच बदलल्या आहेत. फोरव्हिलर मध्ये सुद्धा आताच्या सुखासीन झालेल्या मुलांना थोडीशी अडचण झाली तर सहन होत नाही. मग ती बैलगाडी मध्ये कशी काय बसणार त्यामुळे आपोआपच बैलगाडी संपुष्टात येऊन तिची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. काळाचा महिमा अजून काय…
मी लहान असताना आमच्या घरी तर उन्हाळ्यात असंख्य नातलग
यायचे. शेतात आमराई त्यामुळे घरात आंबेचं आंबे. माझ्या बाबांचे सख्खे, चुलत, सावत्र, आते, मामे, मावस, सगळी भावंडे यायची आणि भाच्चे,भाच्च्या देखील यायच्या. सर्वजण मिळून रहायची, खायची, धमाल करून जायची. सर्वांसाठी खुलं असलेलं माझ्या आई बाबांचं घर. माझ्या आत्याची मुलं तर माझ्या आई बाबांनी स्वतःच्या मुलांसारखी सांभाळली. प्रेम होते म्हणून आपुलकी होती. आपुलकी होती म्हणून आजोळ होतं आणि आहे.
आज जरी विभक्त कुटुंब पद्धती झाली असेल तरी देखील खूप ठिकाणी अजूनही आजोळचं प्रेम पाहायला मिळतं. माझ्याच घरी माझ्या सासूबाई वारल्या, सासरे आता थकले आहेत. पण सर्व नातवंडांसाठी,भाचऱ्यांसाठी आणि नातलगांसाठी माझं घर स्वागताला नेहमी आतुर असतं. सर्वजण येऊन राहतात भरभरून आनंद घेतात.
☆ देसी डोळे परी निर्मिसी… — लेखक – श्री श्रीनिवास बेलसरे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
देसी डोळे परी निर्मिसी, तयापुढे अंधार…
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात जुना सिनेमा मराठी होता ही गौरवास्पद बाब चित्रपटांबद्दलच्या चर्चेत अनेकदा दुर्लक्षित राहते. तो होता खुद्द दादासाहेब फाळके यांनी १९१३ साली दिग्दर्शित केलेला ‘राजा हरिश्चंद्र’. तो मूकपट होता तर पहिला मराठी बोलपट आला १९३२साली, स्व. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला ‘अयोद्ध्येचा राजा.’
परदेशात गाजलेल्या भारतीय चित्रपटांबद्दलच्या चर्चेतही अनेकदा असेच होते. आपल्याला वाटते मराठी चित्रपट म्हणजे फक्त महाराष्ट्रात चालणारे सिनेमा. राजकपूरचा ‘मेरा नाम जोकर’ रशियात लोकप्रिय झाल्याने केवळ तोच परदेशात जास्त लोकप्रिय झालेला अभिनेता होता असा सर्वसाधारण समज असतो. पण मराठी सिनेमांचाही गौरवशाली इतिहास आहेच. दुर्दैवाने त्याचा तितका गवगवा झालेला नाही.
आता ‘प्रपंच’ असे अत्यंत घरगुती नाव असलेला मराठी सिनेमा चक्क चीनमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता हे कुणाला खरे वाटेल का? पण ते सत्य आहे. हल्लीसारखा तेंव्हा चीन स्वस्त पण तकलादू वस्तूंसाठी किंवा त्याच्या राक्षसी विस्तारवादासाठी प्रसिद्ध नव्हता! तेंव्हा चीन प्रसिद्ध होता तो प्रचंड लोकसंख्या आणि विचित्र मांसाहारी पदार्थांच्या सवयींसाठी!
तिथले सरकार कम्युनिस्टांचे, त्यामुळे एखादी समस्या समोर आली की तिचा इलाज लगेच करण्याचे धोरण. आपल्यासारखे ‘याला काय वाटेल?’ ‘तो काय म्हणेल?’ ‘बाबू गेनूसारखी न्यायव्यवस्थाच समस्यानिवारणाच्या रस्त्यात आडवी पडेल का?’ हे प्रश्न त्या सरकारला कधीच पडत नसत. त्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी तातडीने पाउले उचलायची म्हणून आधी प्रबोधनाचे अभियान सुरु केले! आणि हेच कारण होते आपला ‘प्रपंच’(१९६१) चीनमध्ये लोकप्रिय होण्यामागचे.
प्रपंचमध्ये दिग्दर्शकांनी त्याकाळी बहुतेक कुटुंबांत असलेल्या अपत्यांचा अतिरिक्त संख्येचा विषय हाताळला होता. चीनी सरकारला ही बाब आवडली. म्हणून त्यांनी लगेच संपूर्ण सिनेमा चीनी भाषेत डब करून घेतला! मग चीनी लोकांनी तो थियेटरबाहेर अक्षरश: मोठमोठ्या रांगा लावून पाहिला.
त्याचे असे झाले. गदिमांनी लिहिलेल्या कथेवर देव आनंदने ‘एक के बाद एक’ (१९६०) नावाचा सिनेमा काढला. अर्थात हिरो होते देव आनंद. त्याने सोबत शारदाला घेतले आणि दिग्दर्शनाचे काम राजऋषी यांच्याकडे सोपवले. सिनेमा साफ पडला. अनेकांच्या मते, देव आनंदने गदिमांच्या कथेत खूप बदल केले होते.
मग गदिमांनी त्या कथानकावर एक कादंबरी लिहिली. ती गोविंद घाणेकरांना आवडली आणि त्यातून निघाला प्रपंच! दिग्दर्शक ठरले मधुकर पाठक आणि कलावंत होते सीमा देव, आशा भेंडे, सुलोचना लाटकर, कुसुम देशपांडे, अमर शेख, श्रीकांत, शंकर घाणेकर, जयंत धर्माधिकारी.
कथा, पटकथा, संवाद सगळे गदीमांचेच होते. सिनेमा गाजला. त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक ‘स्वर्णकमल’ मिळाले. याशिवाय सर्वोत्तम फिचर फिल्मसाठीचे ‘गुणवत्ताधारक सिनेमाचे’ तिस-या क्रमांकाचे प्रमाणपत्रही मिळाले.
प्रपंचमध्ये गदिमांनी लिहिलेले एक भजनवजा गीत होते. आजही ते रसिकांच्या मनात अजरामर आहे. सुधीर फडकेंनी अतिशय भावूकपणे गायलेल्या या गाण्याला संगीतही त्यांचेच होते. विषय मात्र वेगळाच होता. जसे आपले काही संत महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठूरायाला काहीही बोलू शकतात, कधी तर शिव्याही देतात आणि तरीही त्यांचे त्यांच्या ईश्वराशी असलेले अत्यंत लडिवाळ नाते तसेच टिकून राहते तसे हे गाणे होते. यात गदिमा विठ्ठलाला फक्त कुंभार म्हणून थांबले नव्हते, त्यांनी त्याला ‘वेडा कुंभार’ म्हणून घोषित केले होते!
केवळ एखाद्या भारतीय धर्मातच शक्य असलेले भक्त आणि देवातले गंमतीशीर प्रेमळ नाते या गाण्यात फुलवले असल्याने आकाशवाणीवर सकाळच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात अख्ख्या महाराष्ट्राने हे गाणे असंख्य वेळा ऐकले आहे. गदिमांचे ते शब्द होते-
“फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला, तू वेडा कुंभार.”
विश्वाचा ‘हा जगड्व्याळ पसारा त्या निर्मिकाने कशासाठी निर्माण केला असेल?’ असा प्रश्न प्रत्येक चिंतनशील मनाला कधी ना कधी पडलेलाच असतो. गदिमांनी तोच काव्यरूपाने खुलवून आपल्यापुढे ठेवला आहे. ते करताना त्यांच्यातला भारतीय अध्यात्माची सखोल जाण असलेला विद्वान लपत नाही. मानवी शरीर हे पंच महाभूतातून निर्माण झाले आहे हे सत्य कविवर्य अगदी कुणालाही सहज समजेल इतके सोपे करून सांगतात. मग विठ्ठलाला म्हणतात तू ही मानवी मडकी निर्माण करून त्यांची रास रचून ठेवतोस, त्यांची संख्या तरी केवढी! अक्षरश: अमर्याद! –
माती पाणी, उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा, आभाळच मग ये आकारा. तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार.
त्यात पुन्हा भारतीय अध्यात्माने सांगितलेले सर्व प्राणीयोनीतले मानवी जन्माचे महत्वही ते ‘आभाळच मग ये आकारा’ असे म्हणून सूचित करतात. तू एकाच साच्यातून आम्हाला घडवतोस तरीही प्रत्येकाचे नशीब वेगळेच असते. कुणा भाग्यवान माणसाच्या मुखात भगवान श्रीकृष्णासारखे लोणी पडते तर कुणा दुर्दैवी व्यक्तीच्या तोंडात निखारे पडतात. ही टोकाची विषमता, हा वरून तरी आम्हाला वाटणारा घोर अन्याय तू का सुरू ठेवतोस? बाबा, सगळे तुझे तुलाच माहित!
घटाघटांचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्याविणा ते कोणा न कळे. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार.
जाता जाता गदिमा हेही सांगतात की अगणित कल्पांपासून देव ‘निर्मिती, वर्धन आणि विनाशाचे’ तेच काम करत आला आहे. ना त्याच्या निर्मितीला अंत, ना विनाशाला! जर सगळे नष्टच करायचे आहे तर मग ‘हे सगळे नसते उद्योग तू करतोसच कशाला’? असे एखाद्या धीट अभंगकर्त्याप्रमाणे ते विठ्ठलाला विचारतात-
‘तूच घडविसी, तूच फोडीसी, कुरवाळीसी तू, तूच ताडीसी. न कळे यातून काय जोडीसी, देसी डोळे परी निर्मिसी, तयापुढे अंधार.’
निरीश्वरवादाचा आधारच विश्वाची वरवर वाटणारी अर्थहीनता आहे. बुद्धी असलेल्या सर्वांनाच पडू शकणारे प्रश्न गदिमांनी विचारले आहेत. पण ते कुणा भणंग संशयवाद्यांचे वितंडवाद घालण्याचे मुद्दे नाहीत. ते एका भाविकाने आपल्या निर्माणकर्त्यासमोर निरागसपणे ठेवले प्रश्न आहेत. गाण्याचे शेवटचे वाक्य आपल्या डोळ्यासमोर निरागस अंध व्यक्तींचे अर्धवट संकोची स्मितहास्य असलेले, अश्राप चेहरे आणते. मन गलबलते. देवाचा रागही येतो. पण तिथेच तर मेख आहे.
त्याने डोळे दिलेत आणि त्यापुढे अंधारही दिलेला आहे तो कशाला? खरे तर तेच प्रश्नाचे उत्तर आहे. निर्मात्याने आपल्या अपत्यापुढे मुद्दाम ठेवलेले ते रोचक आव्हान आहे. नुसते डोळे असून थोडाच कुणी डोळस ठरतो? मानवाने आयुष्याचा सदुपयोग करून अंतिम ज्ञानाची प्राप्ती करावी म्हणून तर समोर अज्ञानाचा अंधार ठेवला आहे. चर्मचक्षु असोत नसोत, आपणच पुरुषार्थ करून आपले ज्ञानचक्षु जागृत करणे, सत्य जाणून घेणे यासाठीच तर सगळा उपद्व्याप असायला हवा. गदीमांनी उदाहरण जरी अंध व्यक्तीचे घेतले असले तरी हेतू माणसाचे अज्ञान स्पष्ट करणे हा आहे. त्यातूनच सत्य जाणून घेण्याचे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय अधोरेखित करणे हा त्यांचा हेतू आहे. आणि तोच तर गाण्याचा संदेश आहे.
लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे
मो. 7208633003
संग्राहक : अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈