मराठी साहित्य – विविधा ☆ — श्रीमद् भागवत पुराण कथा ज्ञानयज्ञ … ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆

सुश्री प्रज्ञा मिरासदार

स्व-परिचय 

प्रज्ञा मिरासदार. मूळ गाव पंढरपूर. द.मा. मिरासदार हे माझे दीर. शिक्षण- मराठी विषयात पदवी. मी संस्कृत व इतरही विषयांच्या ट्यूशन्स घेत होते. गाण्याच्या परीक्षा दिल्या आहेत. शास्त्रीय संगीतावर आधारित भजनाचे क्लासेस चालविले. सध्या एकच क्लास चालविते. अनेक विषयांवर लेख लिहिले आहेत. कविता करते. अनेक काव्यसंमेलनात कविता सादर केल्या आहेत. पारितोषिके मिळाली आहेत. प्रत्येक सहलीची प्रवासवर्णने लिहिणे, हा माझा छंद आहे. अमेरिकेत जितक्या वेळा गेले त्या प्रत्येक वेळेची प्रवासवर्णने लिहिली आहेत.

? विविधा ? 

☆ — श्रीमद् भागवत पुराण कथा ज्ञानयज्ञ … ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆ 

दि. २३ सप्टेंबरपासून यंदा श्रीमद्भागवत सप्ताह सुरू झाला. तो २९ सप्टेंबरपर्यंत चालला. अनेक मंदिरे, तीर्थक्षेत्रे, घरे, मठ इथे हा सप्ताह अत्यंत भक्तिभावाने साजरा होतो. तो ऐकण्यासाठी लोक गर्दी करतात. खरोखरच या ग्रंथात प्रचंड प्रमाणात ज्ञान आणि विज्ञान भरलेले आहे. हे श्रीमद् भागवत मूळ संस्कृत भाषेतूनच सांगितले आहे. सर्वसामान्य जनांना संस्कृत भाषा आकलनास अवघड असते. म्हणून पुण्यातील एक विद्वान पंडित कै. प्रा. डॉ. प्रकाश जोशी ( एम्. ए. पी.एच्. डी. ) यांनी आमच्यासारख्या सामान्य जनांसाठी त्या श्रीमद् भागवताचा सारांश सांगणारी सात पुस्तके मराठी भाषेत लिहिली आहेत.

त्यामधे नुसताच अनुवाद नाही तर पूर्ण भागवत पुराणाचा भावार्थ, त्यातील तत्वज्ञान त्यांनी उलगडून सांगितले आहे. शिवाय भाषा सोपी आहे. सुमारे ९० पृष्ठांचा प्रत्येक भाग आहे. त्यामध्ये त्यांनी सुरवातीलाच ही पुस्तके लिहिण्याचा उद्देश सांगितला आहे.ते म्हणतात की, कलियुगात नामस्मरण आणि श्रीमद् भागवत पुराण कथा श्रवण हाच एकमेव उपाय आहे.असे महर्षि वेदव्यासांनी म्हटले आहे. अनेक पुराणे वेदव्यासांनी रचली. तरीही भगवंताच्या अवतार स्वरूपांचे वर्णन करणारे भक्तिरसपूर्ण असे श्रेष्ठ पुराण भागवत पुराण रचल्यानंतरच त्यांना अतीव समाधान प्राप्त झाले होते.

हा भागवताचा ज्ञानदीप प्रथम श्रीविष्णु भगवंतांनी ब्रह्मदेवांना दाखविला. नंतर नारदमुनींना आणि नारदांच्या रूपाने भगवंतानेच महर्षि वेदव्यासांना दाखविला. व्यासमुनींनी त्यांचे पुत्र शुकाचार्य मुनींना दाखविला,तर शुकाचार्यांनी मृत्यूच्या वाटेवर असणाऱ्या राजा परिक्षिताला तो दाखविला.

राजा परिक्षित हा पांडवांचा नातू.  अतिशय न्यायप्रिय होता. धर्मानुसार आचरण व राज्य करीत होता.तो शिकारीस गेला असताना तहानेने व्याकुळ होऊन शृंग ऋषींच्या आश्रमात गेला. तिथे ऋषी ध्यानस्थ बसले होते. त्यामुळे त्यांचे लक्ष राजाकडे गेले नाही. याचा राग आल्यामुळे राजाने जवळच एक मरून पडलेला साप ऋषींच्या गळ्यात अडकविला आणि तो तिथून निघून गेला. थोड्या वेळाने शृंग ऋषींचे पुत्र शौनक ऋषी आश्रमात आले. त्यांनी शापवाणी उच्चारली की, ज्याने हे कुकर्म केले आहे, त्याला आजपासून सात दिवसांच्या आत तक्षक नाग दंश करून मारून टाकील. ऋषींचा हा शाप खराच होणार होता. त्या सात दिवसांत प्रायोपवेशन म्हणून परिक्षित राजा गंगानदी तीरावर नैमिषारण्यात राहिला. तिथे महामुनी शुकाचार्य आले. त्यांना राजा अनेक प्रश्न विचारीत राहिला आणि मुनी शुकाचार्य राजाला श्रीमद् भागवत कथा कथन करते झाले.अशी ही प्रस्तावना आहे.

भाद्रपद शुद्ध नवमी (किंवा अष्टमी ) पासून ते प्रोष्ठपदी पौर्णिमेपर्यंत सात दिवस भागवत पुराण सप्ताह ऐकण्याची, ऐकविण्याची परंपरा भारत देशात हजारो वर्षांपासून अव्याहतपणे चालू आहे. तसे त्याचे पारायण केव्हाही केले तरी चालते. त्यासाठी डॉ. प्रकाश जोशी यांनी सर्वसामान्य जनांसाठी ही सात अत्यंत श्रवणीय, भागवताचे पूर्ण सार सामावलेली पुस्तके मराठी भाषेत लिहिली आहेत. चार ते पाच तासात एक पुस्तक वाचून होते.

दुर्दैवाने लेखक डॉ. प्रकाश जोशी वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी अकालीच निधन पावले. त्यांच्या मृत्यूनंतर गीताधर्म मंडळाने ही सात पुस्तके प्रकाशित केली आहेत. मी स्वतः प्रतिवर्षी ही पुस्तके वाचते. माझ्या घरी श्रीमद् भागवत सप्ताह साजरा होतो. अत्यंत साधेपणाने पण भक्तिभावाने आम्ही सगळे मिळून तो संपन्न करीत असतो.

ती पुस्तके वाचल्यानंतर श्रीमद् भागवत वाचनाचे, श्रवणाचे पूर्ण समाधान मिळते. या सात पुस्तकांचे संक्षिप्त वर्णन मी पुढे काही भागात करीत आहे. सर्वांना ते वर्णन आवडेल अशी आशा करते.

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “रस्ता…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “रस्ता…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

रस्ता…… एक निर्जीव असला तरी आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग. किती प्रकाराने, वेगवेगळ्या अर्थाने आपण याचा उल्लेख करतो.

रस्ता…… सरळ, वेडावाकडा, चढ उताराचा, डोंगरदरीतून जाणारा, छान, खड्डे असलेला, किंवा नसलेला, घाटाचा अशा अनेक प्रकाराने आपण त्याबद्दल बोलतो. तर कधी कधी खडतर, प्रगतीचा, साफ अस म्हणत आपल्या आयुष्याशी त्याचा संबंध लावत त्या बद्दल व्यक्त होतो‌.

रस्त्याने आपण सहज कधीच जात नाही. अगदी सहज म्हणून बाहेर पडलो, अस म्हटलं तरी वेळ घालवण हाच उद्देश त्यामागे असतो.

रस्त्याने जातायेता आपण काही गोष्टी बघतो, काही नजरेआड करतो, काही गोष्टींकडे आपल लक्ष वेधल जात, काही गोष्टी आपण टाळतो. अस बरच काही रस्त्यावर करतो.

कोणी येणार असेल तर ते येण्याच्या आधीपासूनच अधूनमधून आपण रस्त्यावर नजर टाकतो. तर कोणाला निरोप द्यायचा असेल तर ते दृष्टीआड होईपर्यंत आपली नजर रस्त्यावर खिळलेली असते.

रस्ता निर्जीव आहे अस म्हटल तरी प्रत्येक रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींचा, इमारतींचा, तिथल्या परिस्थितीचा प्रभाव रस्त्यावर आहे अस आपल्याला वाटत.

इस्पितळं असणाऱ्या रस्त्यावर एक प्रकारची शांतता, तणाव, काळजी, हुरहूर, किंवा सुटकेचा निःश्वास असल्याचं, तर शाळेच्या रस्त्यावर मुलांचा कलकलाट बागेतल्या पक्षांच्या चिवचिवाटा सारखा मुक्त वाटतो. महाविद्यालयाच्या रस्त्यावर तारुण्याची कारंजी उडत असतात. तर चित्रपटगृह, आणि उद्यानाच्या रस्त्यावर उत्साह.

बाजाराच्या रस्त्यावर भाजीपाला, फळं, फुलं यांची रेलचेल असते. तर मध्येच उपहारगृहातील पदार्थांचे वास आपल्याला नाक, जीभ, आणि पोट असल्याची जाणीव करून देतात. सोबत रसवंतीच्या घुंगरांचा नाद कानावर येतो. सराफ बाजारातील रस्त्यावर चकचकाट व लखलखाट असतो. तर धार्मिक ठिकाण असलेल्या रस्त्यावर प्रसन्नता जाणवते.

रस्त्यावर असलेल्या इमारतींचा, हालचालींचा, आणि वातावरणाचा संबंध आपण रस्त्याशी लावतो, तसच रस्त्यांच रुप सकाळ, दुपार, संध्याकाळ, आणि रात्र अशावेळी वेगवेगळ असत, आणि ते आपल्याला जाणवतं.

सकाळी लगबगीचा, दुपारी थोडा सुस्तावलेला, लोळत पडलेला, संध्याकाळी उत्साहाने वाहणारा, तर रात्री, दिवसभराच्या धावपळीने हळूवारपणे, हातात हात घेत रमतगमत पावलं टाकत जाणारा वाटतो.

उत्सवाच्या आधी आणि उत्सवाच्या वेळी असलेल रस्त्यावरच वातावरण उत्सव संपल्यावर बदलल्या सारख वाटत.

शहर, प्रांत, बोलीभाषा, राहण्याचे ठिकाण यावरून जसं माणसाच वेगळेपण लक्षात येत, तसच रस्त्यांच सुध्दा आहे. गावातला, शहरातला, कच्चा, पक्का, रुंद, दोन, चार पदरी, राष्ट्रीय अस वेगळेपण असत.

कितीतरी गाण्यांमध्ये सुध्दा रस्ता या शब्दाचा वापर केला आहे.  रस्ता…… तोच तसाच असतो. पण वेळ आणि प्रसंगानुसार आपण त्याचं वेगळेपण अनुभवत असतो. मिरवणूक, प्रचार, उपोषण, मोर्चा, वारी या सारख्या अनेक गोष्टींसाठी लागतो तो रस्ता…….

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महानायक  आजारी पडतो तेव्हा…  ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ महानायक  आजारी पडतो तेव्हा…  ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

(तीन वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन कोरोनामुळे आजारी पडून दवाखान्यात भरती झाले होते. त्यावेळी सिनेसृष्टीतील विविध कलाकार आणि नेते त्यांच्या भेटीसाठी येतात अशी कल्पना करून हा लेख लिहिला आहे हा लेख पूर्णपणे काल्पनिक आहे. वाचकांना काही क्षण आनंद द्यावा हाच या लेखाचा उद्देश आहे )

चित्रपट सृष्टीतील महानायक अमिताभ अर्थात बिग बी स्मॉल बी, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांच्यासह  कोरोनाची बाधा झाल्यामुळे  मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. या प्रसंगी त्यांना राजकारणी आणि सिने क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती भेटायला येतात. त्यांच्यामध्ये काय काय संवाद होतात ते बघा.

सुरुवातीला नानावटीचे डॉक्टर, ‘ बच्चनसाब, आप चिंता मत किजीये. आप जल्दी ठीक हो जायेंगे. वैसे मै आपका बेड कहा लगवा दु ? ‘

‘ये भी कोई पुछनेकी बात है डॉक्टर साहब? आप तो जानते है की हम जहाँ खडे (अब पडे) होते है, लाईन वहींसे शुरु होती है. आप जहाँ चाहे हमारा बेड लगवा सकते है.’

अमिताभला स्पेशल रूम दिली जाते. तो बेडवर पडलेलाच असतो तेवढ्यात त्याला भेटायला राजेश खन्ना येतो.

‘ ए बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिये. लंबी नही. ये तो मेरा डायलॉग है. ये मेरी जगह तुमने कैसे ले ली बाबू मोशाय.? मै जानता हूं तुम्हे कुछ नही होगा. भगवान तुम्हारे सारे दुख मुझे दे दे और तुम्हे लंबी आयु दे. ‘ असं म्हणून आपल्या खास स्टाइलमध्ये काका उर्फ राजेश खन्ना त्याचा निरोप घेतो.

तो जात नाही तोपर्यंत शशी कपूर येतो. अमिताभला बेडवर पाहून त्याला वाईट वाटते. तो म्हणतो

‘ मेरे भाय, तुम्हारी जगह यहा नही है. शायद तुम गलतीसे यहा आ गये हो. ‘

अमिताभ त्याला म्हणतो, ‘ हां, मेरे भाई. होता है ऐसा कभी कभी. ये सब तकदीर का खेल है. तुम हमेशा कहते थे ना की तुम्हारे पास क्या है ? तो लो आज सून लो. मेरे पास कोरोना है. बिलकुल नजदिक मत आना. वरना ये तुम्हे भी पकड लेंगा. ‘

शशी कपूर घाबरतच निघून जातो. तेवढ्यात धर्मेंद्रचे आगमन होते.

‘ जय, ये कैसे हो गया जय  ? क्या हमारी दोस्ती को तुम भूल गये ? तुम्हे याद है ना वो गाना जो हम कभी गाया करते थे. ये दोस्ती हम नही तोडेंगे. मै तुम्हे अकेला नही लडने दूंगा इस बिमारीसे . तुम बिलकुल अकेले नही हो मेरे दोस्त. हम दोनो मिलके इसे खत्म करेंगे.’

एवढ्यात तिथे संजीवकुमारचे आगमन होते. त्याने अंगावर शाल पांघरलेली असते. धर्मेंद्रचे बोलणे त्याच्या कानावर पडलेले असते. तो दातओठ खाऊन म्हणतो

‘ तुम उसे नही मारोगे. तुम उसे पकडकर मेरे हवाले करोगे. इन हाथोमे अब भी बहुत ताकत है. ‘

धर्मेंद्र आणि अमिताभ म्हणतात, ‘ हम कोशिश जरूर करेंगे, ठाकूरसाहब. लेकीन ये अब बहुत कठीन लगता है.’

‘ कोशिश नही, तुम उसे पकडकर मेरे हवाले करोगे. हमे उसे इस दुनियासे खत्म करना है. और भी अगर पैसोंकी जरूरत हुई तो मांग लेना. मगर ध्यान रहे की आसान कामोके लिये इतने पैसे नही दिये जाते. ‘

ठाकूरसाब उर्फ संजीवकुमार गेल्यानंतर तिथे अमजदखान उर्फ गब्बरचे आगमन होते. ( इथे गब्बर म्हणजे कोरोना आहे असे आपण समजू. ) सगळे नर्सेस, वॉर्डबॉय घाबरून एका कोपऱ्यात लपतात. डॉक्टर्स त्यांच्या रुममध्येच असतात. त्याची एंट्री झाल्याबरोबर ते विशिष्ट शिट्टीचे संगीत वाजते. नंतर ऐकू येते ते गब्बरचे गडगडाटी हास्य.

‘ आ गये ना इधर ? अपनेको मालूम था भिडू की एक दिन तुम इधरच आनेवाला है. जो अपने पीछे पडता है, उसका यही अंजाम होता है. पता है तुम्हे की घरमे जब बच्चा रोता है और बाहर जाने की जिद करता है, तो माँ उसे कहती है की बेटा बाहर मत जा. कोरोना तुम्हे पकड लेगा. जो नही सुनता है उसका यही हाल होता है. कितना इनाम रखा है सरकारने हमारे सरपर, लेकिन अभीतक कोई हमारी दवा नही बना पाया . ‘  असे म्हणून तो घोड्यावर स्वार होऊन तेथून निघून जातो. (उगवतीचे रंग -विश्वास देशपांडे)

काही वेळाने त्या ठिकाणी अमरीश पुरीचे आगमन होते. गेटच्या बाहेरूनच त्यांचा खर्जातला आवाज ऐकू येतो. हॉस्पिटलच्या रिसेप्शन काउंटरवर कोणी तरी त्यांचे ओळखपत्र मागतं.

‘ तुम्हारी हिम्मत कैसे हुई ? मुझसे मेरा पहचानपत्र मांगते हो ? खबरदार अगर किसीने भी मुझे रोकने की कोशिश की तो. ‘ सगळे घाबरून बाजूला होतात. अमरीश पुरींचा प्रवेश थेट अमिताभच्या रूममध्ये होतो. आपल्या खर्जातल्या आवाजात अमिताभला मोठे डोळे करून विचारतात

‘ ऐसे क्या देख रहे हो ? क्या मै तुम्हे मिलने नही आ सकता ? देखो, इस वक्त तुम बिमार हो. मुगाम्बो खुश हुआ ये तो नही कह सकता ना…! मै तुम्हे एक हफ्ते की मोहलत और देता हूँ. इतने समयमे अगर तुम ठीक नही हुए तो मूझेही कुछ करना पडेगा. ‘

अशातच प्रवेशद्वारावर अभिनेत्री रेखाचे आगमन होते. तिच्या हातात सामानाच्या दोन पिशव्या असतात. रेखाचे आगमन झाल्यानंतर सगळेच तिचे मोठ्या अदबीने स्वागत करतात. डॉक्टर विचारतात, ‘ क्या आपको जया भाभी और ऐश्वर्यासे मिलना है ?  ‘

रेखा म्हणते जी नही उन्हे तो मैं बाद मे मिलुंगी.  मुझे पहले अमितजी से मिलना है.

एक नर्स तिला अमिताच्या रूम मध्ये घेऊन जाते. तिला पाहिल्यानंतर अमिताभचे चेहऱ्यावरती हास्य फुलते आणि तो उठून बसायला लागतो तेव्हा रेखा म्हणते, ‘ जी नही आप उठीये मत आप. आपको आराम की जरूरत हैं.

मैंने आपके लिए कुछ लाया है.  ये जो छोटा बॉक्स है इसमे मेरे हाथ से बनाये हुये कुछ मास्क है. आप इन्हे पहनने से जल्दी ठीक हो जायेंगे. दुसरी बॉक्स मे आपके लिये स्टीमर लायी हूं.  दिन मे दो तीन बार स्टीम लेना. मैने अपने हाथोसे तुम्हारे लिये बादाम की खीर बनाई हुई है. जो आपको बहुत पसंद है. इसे जरूर खाना.’  असे म्हणत ती डोळे पुसते. आप जल्दी ठीक हो जाइये अमितजी… और क्या कहू…? बाकी तो आप जानते हैं…’

अशातच बातमी येते की माननीय मुख्यमंत्री अमिताभच्या भेटीला येताहेत. नर्सेस, वॉर्डबॉय यांची धावपळ सुरु होते. डॉक्टर्स आपलं ते पीपीई की काय ते किट घालून तयार असतात. साफसफाई करणाऱ्यांवर उगीचच आरडाओरडा केला जातो. अमिताभची रूम स्वच्छ असली तरी परत एकदा जंतुनाशकाचा फवारा मारून आणि फरशा स्वच्छ पुसून चकाचक केली जाते. मुख्यमंत्री थेट अमिताभच्या खोलीत येतात. सोबत डॉक्टरांची टीम आहेच. अमिताभ त्यांना पाहिल्यानंतर उठून नमस्कार करण्याचा प्रयत्न करतो.

‘ अरे, आप उठीये मत. आराम किजीये . आपको जल्दी ठीक होना है. अब कैसा लग रहा है आपको ? ‘

‘ जी मै बिलकुल ठीक हूँ. ‘

‘ कोई परेशानी तो नही ना..? अगर हो तो हमे बताओ. ‘

डॉक्टरांकडे वळून, ‘ हे बघा, यांची नीट काळजी घ्या. अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या यांच्याकडेही नीट लक्ष द्या. मला कोणतीही तक्रार यायला नको आहे. ‘

प्रमुख डॉक्टर, ‘ साहेब, आम्ही आमच्या परीने शक्य ते सर्व प्रयत्न करतो आहोत. आपण कोणतीही काळजी करू नका. ‘

मुख्यमंत्री ‘ मग ठीक आहे. प्रयत्न करताय ना. केलेच पाहिजे. काळजी घेताय ना ? काळजी तर घेतलीच पाहिजे. काळजी घेतल्याशिवाय कसं चालणार ?  काळजी घेणंच फार महत्वाचं आहे. कोरोनाचं संकट आपल्या सर्वांवरच आहे. आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यावर मात केली पाहिजे. त्याशिवाय तो जाणार कसा ? ‘ डॉक्टरांना सूचना देऊन मा मुख्यमंत्री आपल्या ताफ्यासह निघून जातात.

दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलच्या बाहेर अजून कडक बंदोबस्त दिसतो. सुरक्षा वाढवली जाते. ब्लॅक कॅट कमांडो इमारतीचा ताबा घेतात. बातमी येते की मा पंतप्रधान अमिताभची विचारपूस करण्यासाठी येत आहेत. सकाळी दहा वाजण्याच्या सुमाराला त्यांचे आगमन होते. आपल्या सुरक्षा पथकाला बाहेरच ठेवून ते एकटेच अमिताभच्या भेटीला येतात. प्रवेशद्वारावर डॉक्टरांची टीम त्यांचं अदबीनं स्वागत करते. चालता चालता ते डॉक्टरांना विचारतात

‘ कहिये, सब ठीक तो है ? ‘

सगळे डॉक्टर्स एका आवाजात, ‘ येस सर. एव्हरीथिंग इस ओके. वी आर ट्राईन्ग अवर बेस्ट. ‘

अमिताभच्या रूममध्ये येतात. अमिताभ आधीच बेडवर उठून बसलेला असतो. त्यांना पाहिल्यावर हात जोडून नमस्कार करतो.

‘ कैसे हो ? यहां कोई कमी तो नही  ? ‘ मा. पंतप्रधान

‘ जी नही. आप हमे देखने आये ये तो हमारा सौभाग्य है. ‘

‘ अरे ऐसे क्यू कहते हो अमितजी ? आपकी ओर तो पुरे देश का ध्यान लगा हुआ है. आपको जल्दी ठीक होना है और लोगोंको बताना भी है की कोरोना महामारी का मुकाबला आपने कैसे किया. तो आप जल्दी ठीक हो जाईये. ‘

मग एका हॉलमधेय मा पंतप्रधान हॉस्पिटलच्या नर्सेस, वॉर्डबॉय आणि डॉक्टर्सना पाच मिनिट संबोधित करतात.

‘भाइयों और बहनो, मै जानता हूँ की इस परीक्षा की घडी मे आप सब जी जानसे मेहनत कर रहे हो. ध्यान रहे की कोरोना को हमे हर हाल मे हराना है. दुनिया की ऐसी कोई बिमारी नहीं है की जो ठीक नहीं हो सकती. हमे सावधानी बरतनी होगी. अपनी इम्युनिटी बढानी होगी. योग और प्राणायाम के नियमित करनेसे हमे इसे दूर रखनेमे सहायता होगी. जल्दी ही हम इस बिमारी पर काबू पाने की कोशिश करेंगे और दुनिया को ये दिखा देंगे की भारत के पास हर समस्या का समाधान है और हम दुनियाको भी मार्गदर्शन कर सकते है. जय हिंद. आप सभी को मेरी शुभ कामनाये. ‘

अशा रीतीने मा. पंतप्रधानांच्या भेटीने अमिताभला भेटणाऱ्यांचा सिलसिला संपतो. नंतर डॉक्टरांनी इतरांना भेटीची मनाई केली आहे

लेखक – श्री विश्वास देशपांडे,

चाळीसगाव

 ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझी मराठी… ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? विविधा ?

माझी मराठी… ☆ श्री राजीव गजानन पुजारी

मराठी भाषा ही १५०० वर्षे जूनी असून तिचा उगम संस्कृत मधून झाला. समाज जीवनातल्या बदलानुसार ही भाषा बदलत गेली. मराठीचा आद्यकाल हा इ. स. १२०० च्या पूर्वीचा म्हणजे ज्ञानेश्वरीच्या लिखाणाच्याही आधीचा होय. या काळात विवेकसिंधू या साहित्यकृतीची निर्मिती झाली. यानंतरच्या काळाला यादवकाल म्हणता येईल. इ.स. १२५० ते इ. स.१३५० हा तो काळ. या काळात महाराष्ट्रावर देवागिरीच्या यादवांचे राज्य होते. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा होता. लेखक व कवी यांना राजाश्रय होता. याच काळात वारकरी संप्रदायची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या सर्व जातींमध्ये संत परंपरा जन्माला आली. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे काव्य रचनेस सुरुवात केली. नामदेव, गोरा कुंभार, सावता माळी, चोखा मेळा, कान्होपात्रा यांनी भक्तीपर रचना केल्या व मराठी भाषेचे दालन भाषिक वैविध्याने समृद्ध व्हायला सुरुवात झाली. इ. स. १२९० साली ज्ञानेश्वरमाऊलींनी ज्ञानेश्वरी मराठी भाषेत लिहिली. ती लिहिण्यापूर्वी माऊली म्हणतात,

‘माझा मराठीची बोलू कौतुके |

परि अमृतातेही पैजा जिंके |

ऐसी अक्षरे रसिके मेळवीन ||’

आणि ज्ञानेश्वरी वाचल्यावर मराठी भाषा अमृताहून गोड आहे याची सार्थ जाणीव होते. याच काळात महानुभव पंथ उदयास आला. चक्रधर स्वामी, नागदेव यांनी मराठी वाङमयात मोलाची भर घातली. त्यानंतर येतो बहामनी काळ. हा काळ इ. स.१३५० ते इ. स. १६०० असा मानता येईल. सरकारी भाषा फारसी झाल्याने, मराठी भाषेत अनेक फारसी शब्द घुसले. या मुसलमानी आक्रमणाच्या धामधूमीच्या काळातही मराठी भाषेत चांगल्या साहित्याची भर पडली. नृसिंहसरस्वती, एकनाथ, दासोपंत, जनार्दन स्वामी यांनी मराठी भाषेत भक्तीपर काव्यांची भर घातली. यानंतर येतो शिवकाल. तो साधारण इ.स.१६०० ते इ. स.१७०० असा सांगता येईल. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली होती. शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडित यांना राज्यव्यवहार कोष बनवितांना फारसी ऐवजी संस्कृत शब्दयोजना करण्यास सांगितले. याच काळात मराठीस राज्य मान्यतेसोबत संत तुकाराम, संत रामदास यांचेमुळे लोकमान्यताही मिळू लागली. यानंतर येतो पेशवेकाल. हा इ. स.१७०० ते इ. स. १८२० असा सांगता येईल. या काळात मोरोपंतांनी ग्रंथ रचना केली. कवी श्रीधर यांनी आपले हरिविजय व पांडव प्रताप या काव्यांद्वारे खेड्यापाड्यात मराठी भाषा रुजविली. याच काळात शृंगार व वीर रसांना वाङमयात स्वतंत्र स्थान मिळाले. यासाठी लावणी व पोवाडा यांची निर्मिती झाली. वाङमय हा रंजनाचा प्रकार आहे हे समाजाने मान्य करण्यास सुरुवात केली. वामन पंडित, रामजोशी, होनाजी बाळा हे या काळातील महत्वाचे कवी होत. या नंतरचा काळ आंग्लकाळ म्हणता येईल. हा इ. स. १८२० ते इ. स.१९४७ पर्यंतचा मानता येईल. याच काळात कथा व कादंबरी लेखनाची बीजे रोवली गेली. नियतकालिके छपाईच्या सुरुवातीचा हा काळ. त्यानंतर मराठी भाषेचा उत्कर्ष वेगाने होत गेला. १९४७ ते १९८० हा काळ सर्वदृष्टीने मराठीच्या उत्कर्षाचा काळ म्हणता येईल. विजय तेंडुलकरांच्या नाटकांनी मराठीला वास्तववादी बनविले. छबीलदास चळवळ या काळात जोरात होती. दलित साहित्याचा उदयही याच काळातला. सरोजिनी वैद्य, विजया राजाध्यक्ष यांच्या साहित्य व समीक्षांचा दबदबा या काळात होता. मध्यम वर्गीयांसाठी पु.ल., व.पु. होते. प्रस्थापिताला समांतर असे श्री. पु. भागवतांचे ‘सत्यकथा’ व वाङमयीन क्षेत्रातील गॉसिपचे व्यासपीठ ‘ललित’ याच काळातील. याच काळात ‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाईंडर’, ‘गिधाडे’ ही काळाच्या पुढची नाटके येऊन गेली. थोडक्यात म्हणजे इ.स.१२०० च्या सुमारास सुरु झालेली मराठी भाषेची प्रगती इ.स. १९८० पर्यंत चरम सीमेला पोहोचली. समजातील सर्व विषय कवेत घेणारी अशी ही मराठी भारतीय भाषा भगिनींमध्ये मुकुटमणी आहे.

मराठीत पु. ल. देशपांडे, चि. वि. जोशी यांनी लिहिलेले विनोदी लिखाण आहे, ज्ञानदेव, तुकारामादि संतांनी लिहिलेले भक्तीरसाने ओथंबलेले संत वाङ्मय आहे, ना.सी.फडके आदिंनी लिहिलेले शृंगारिक वाङ्मय आहे, लावणीसारखा शृंगारिक काव्यप्रकार आहे, आचार्य अत्रे लिखित ‘झेंडूची फुले’ सारखे विडंबनात्मक साहित्य आहे, वि.स.वाळिंबे सारख्यांनी लिहिलेले चरित्रग्रंथ आहेत, नारळीकर, बाळ फोंडके लिखित वैज्ञानिक कथा आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘१८५७ चे स्वातंत्र्य समर’ सारखे वीर रसाने युक्त ग्रंथ आहेत, पोवाडे आहेत, अनंत कणेकर, पु. ल. देशपांडे सारख्यानी लिहिलेली उत्तमोत्तम प्रवासवर्णने आहेत, ग. दि. मा. लिखित ‘गीत रामायण’ म्हणजे नवरसांचे संमेलनच जणू!! यातील प्रत्येक काव्य वेगळ्या रसात आहे. मराठीत बाबुराव अर्नाळकर लिखित गुप्तहेरकथा व भयकथा आहेत, नारायण धारप लिखित गूढकथा आहेत, साने गुरुजींची शामची आई म्हणजे मराठीचे अमूल्य रत्नच जणू! रामदास स्वामींनी लिहिलेला दासबोध म्हणजे निवृत्ती व प्रवृत्ती यांचे सुयोग्य संमिलनच आहे. त्यांनीच लिहिलेल्या मनाच्या श्लोकांत मानसशास्त्राची मूलभूत तत्वे सामावलेली आहेत. मराठीत इतर भाषांतून अनुवादिलेल्या उत्तमोत्तम कलाकृती आहेत. मराठी नाटक म्हणजे मराठी भाषेतील रत्नालंकार होत. अगदी राम गणेश गडकरींचा ‘एकच प्याला’ ते विजय तेंडुलकरांच्या ‘घाशीराम कोतवाल’ पर्यंत मराठी नाटकांचा एक विस्तृत पटच आहे. हे सर्व बघितल्यावर मराठी ही एक अभिजात भाषा आहे याची खात्री पटते.

मातृभाषेची गोडी शालेय वयापासून लावणे हे पालक व शिक्षकांचे कर्तव्य आहे. स्वातंत्र्योत्तर काळ ते साधारण १९८० पर्यंत मराठी शाळांची स्थिती ‘चांगली’ म्हणावी अशी होती. पालक मुलांना मराठी शाळांत पाठवत. घरी देखील मराठी बोलले जाई. पण १९८० नंतर हळूहळू सर्व बदलत गेले. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले. पालक मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणे प्रतिष्ठेचे मानू लागले. जागतिकरणानंतर स्थिती आणखी बिघडली. खेडोपाडी व घराघरात पाश्चात्य संस्कृतीबरोबरच पाश्चात्य भाषेनेही सर्रास प्रवेश केला. ‘माझ्या मुलाला /मुलीला मराठी बोलता येत नाही’ असं सांगणं यात पालकांना प्रतिष्ठा वाटू लागली. अशा परिस्थितीत मराठीचे भवितव्य काय?

मला तर वाटतं मराठीचे भवितव्य उज्वलच आहे. याचे महत्वाचे कारण ‘नवीन शैक्षणिक धोरण’. यात मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात आला आहे.अगदी अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण देखील मातृभाषेतून देण्यात यावे असे सरकारचे धोरण आहे. विज्ञानातील मूलभूत संकल्पना मातृभाषेतून चांगल्या समजतात हे आता सर्वमान्य झाले आहे. त्यामुळे अधिकाधिक विध्यार्थी मराठीकडे वळतील व मराठीला पूर्वीचे वैभव प्राप्त होईल. यासाठी आपलीही कांही जबाबदारी आहे. अगदी आपल्या राज्यातही परभाषी व्यक्तीशी आपण हिंदीतून अथवा इंग्रजीतून बोलतो. असे न करता आपण आवर्जून मराठीतूनच बोलले पाहिजे. मराठीतून बोलण्यात न्यूनगंड बाळगण्यासारखे अजिबात नाही. जेव्हा पत्रकार परिषद होते तेंव्हा आपले नेते प्रथम मराठीतून बोलतात, पण जेंव्हा एकदा पत्रकार ‘हिंदीमे बोलिये’ असे म्हणतो, तेंव्हा आपले नेते परत तीच वक्तव्ये हिंदीत करतात. हे आवर्जून टाळायला हवे. नेत्यांनी पत्रकाराला ठणकवायला हवं कि, मी हिंदीत वगैरे अजिबात बोलणार नाही, तूच मराठीत बोल. अशा छोटया छोटया गोष्टी आपण करत गेलो कि, आपोआपच मराठीला इतर लोकंही सन्मानाने वागवायला लागतील.

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महिषासूरमर्दिनी.. ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

?विविधा ?

☆ महिषासूरमर्दिनी.. ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

झेंडूच्या फुलांच्या पायघड्यांवरून अलगदशी शारदीय नवरात्रीची मंगलमय सुरुवात झाली.तसा सगळीकडेच उत्साह नुसता ओसंडून राहिला आहे.नवरात्र म्हणजे नऊ दिवस, नऊ रात्रीचा आदिशक्ती आदिमातेच्या उपासनेचा दरवर्षी येणारा उत्सव..!

अश्विन शुध्द प्रतिपदेला घटस्थापना होते म्हणजे देवीच्या नवरात्रीची सुरुवात होते.या आदिशक्तिला आपली संस्कृती स्त्रीरुपात पहाते. आपण तिची श्रध्देने पूजा-अर्चा करतो.तिला आई,माता,माय-माऊली संबोधतो.

आपल्या परिवारालाच नाही तर अवघ्या जगताला प्रसन्न करणारी ती जगदंबा जगतजननी आहे.आपल्या पुराणातील कथांमध्ये देवी आणि असुरीशक्ति यांचे द्वंव्द वर्णन केले आहे.त्यातील एक कथा प्रसिद्ध आहे महिषासूर या असुरांच्या राजाने उन्मत्तपणे पृथ्वीवर तर धमाकूळ घातला होताच पण देवतांनाही जिंकून 

घेतले व  स्वर्गावर राज्य करण्याची तयारी केली.तेव्हा ब्रम्हां,विष्णु,शंकर यांनी आपल्या तेजातून एक आदिशक्ती निर्माण केली.तिने नऊ दिवस नऊ रात्र महिषासूराशी युध्द करुन त्याचा वध केला.म्हणजे आसुरीशक्ती नष्ट केली.

प्रत्येक माणसामध्ये चांगली-वाईट प्रवृत्ती असतेच.त्यातील वाईट प्रवृत्ती म्हणजे आपल्या मनांवर ,बुध्दीवर असलेले महिषासूराचे वर्चस्व, साम्राज्य.. ते नष्ट व्हावे,आपणास सदैव सद्बुध्दी लाभावी यासाठी कलश-घट यांची पूजा म्हणजे आपल्याच देहातील आत्म्याची पूजा करुन, अखंड ‘दीप’ लावून आत्मतेज मिळवावे.,ही कल्पनाच किती सुंदर वाटते.

यासाठी श्रध्दा,भक्ती आणि आंतरिक अशी परमेश्वराची ओढ असावी लागते.केवळ कर्मकांड असून चालत नाही.नवरात्रात जागरण म्हणजे देवीचा जागर,पूजापाठ,आरती,ही महत्वाची असली तरी देवीची उपासना करणे हा मुख्य उद्देश आहे.मग देवी कोणत्याही रुपात असो.महाकाली,महालक्ष्मी,महासरस्वती या तीन महाशक्ती यांची उपासना करुन आपण आपल्या षड्रिपूंवर विजय मिळावा, अवगुणांचा -हास व्हावा,संकटांना,वाईट प्रवृत्तींना सामोर जाण्याची क्षमता प्राप्त व्हावी यासाठी या आदिशक्तिला शरण जातो.तिला जोगवा मागतो.’ गोंधळाला ये ‘..अशी आपुलकीची साद घालतो.

सगळीकडे भ्रष्टाचार, अत्त्याचार, हिंसाचार, व्देष,नैसर्गिक आपत्ती,रोगराई पसरली असेल अशावेळी आत्मतेज वाढवून, दुर्जनांचा नाश करुन,प्रतिकूल परिस्थितीतही आपल्याला तारुन नेणाऱ्या आदिमातेला -शक्तीला

मनांपासून प्रार्थना करुयात..

‘हे महिषासूरमर्दिनी…’

आई तुझ्या पदाचा..

देई सर्व काल संग..।

दावी तुझ्या कृपेचे..

तेजोमयी तरंग..।।

या मनांपासून दिलेल्या सादाला ती

जगत् जननी नक्कीच धांवून येईल.

तिच्या चरणाशी दुजाभाव नसतोच.

सगळी तिचीच लेकरे!मग वाईट गोष्टींतून केवळ वर्तमान काळच नव्हे तर आपला भविष्यकाळही कायमचा मुक्त होईल…अन् खऱ्या अर्थाने विजयोत्सव साजरा करण्याचा,विजयपताका फडकविण्याचा ‘दसरा ‘ उजाडेल.!

‘सोनियाचा दिवस’ म्हणून सोने लुटतांना आगळाच आनंद लुटता येईल…!

© सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे .३८

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संत मुक्ताबाई… ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ संत मुक्ताबाई… ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

संत मुक्ताबाई

(जन्म-आश्विन शुद्ध प्रतिपदा शके १२०१,आपेगाव,पैठण वैशाख वद्य द्वादशी शके १२१९ मृत्यू तापीवरील मेहूण गाव).

  मुंगी उडाली आकाशी ,तिने गिळिले सूर्याशी

थोर नवलाव झाला, वांझे पुत्र प्रसवला

विंचू पाताळासी जाय , शेष माथा वंदी पाय

माशी व्याली घार झाली , देखोनी मुक्ताई हासली…

-संत मुक्ताबाई

आश्विन शुद्ध प्रतिपदा ! आज घटस्थापना, आदिशक्तीचा जागर करण्याचे पर्व आणि संत मुक्ताबाई यांचा जन्म म्हणजे एका आदिमायेचाच जन्म दिवस म्हणायला हरकत नाही. आदिशक्ती असलेली मुक्ताई संत ज्ञानेश्वरांची प्रेरणा स्थान होती. तिचे ताटीचे अभंग हे संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी निर्मिती मागची प्रेरणा होती. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई ही चार भावंडे म्हणजे आपेगावच्या विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी यांची मुले. बुद्धिमान व विरक्त असलेले विठ्ठलपंत लग्नानंतर संन्यास घेतात आणि काशीला जाऊन राहतात. पण पतिव्रता पत्नी रुक्मिणी प्रयत्नपूर्वक त्यांना गृहस्थाश्रमात आणते.विवाह होऊन ही संन्यास घेतलेला समजताच त्यांना पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारण्याची आज्ञा काशीच्या गुरूंकडून मिळते. पण समाज त्यांना वाळीत टाकतो. परंतु याची शिक्षा समाज त्यांना देतो ती म्हणजे देहांत प्रायश्चित्त. चार चिमुकल्या मुलांसह कुटुंबाच्या होणार्‍या छळाला  कंटाळून विठ्ठल पंत व रुक्मिणी ठरवतात की आपल्या मुलांना समाज त्यामुळे स्वीकारणार असेल तर आपण हे प्रायश्चित्त घेऊ आणि खरच ते दोघेही ही शिक्षा म्हणून आत्मविसर्जन करतात. देहांत प्रायश्चित्त घेतात. त्या वेळी मुक्ताबाई फक्त चार वर्षाची असते.

भावंडांचा सांभाळ करण्याची जबाबदारी मोठ्या निवृत्तीवर येऊन पडते. निवृत्ती, ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही सन्याशाची मुलं म्हणून समाज त्यांनाही वाळीत टाकतो.आईवडिलांचे छत्र गेले तरीही समाज मुलांना स्वीकारत नाही. जन्मापासून मुलांची परवड सुरूच असते. या कोवळ्या मुलांना स्वताला सतत सिद्ध करावे लागत असते. अशा परिस्थितीत छोटी मुक्ताबाई प्रौढ झाली नाही तरच नवल. समाजाने केलेला अन्याय आणि अपमान सहन करत करत लहनाची मोठी होत असते मुक्ताई,

तात आणि माता गेलीसे येथून,तेंव्हा आम्ही लहान पांडुरंगा |

निवृत्ती ज्ञानेश्वर कोरान्नाचे अन्न ,सांभाळी सोपान मजलागी || 

तुझ्या योगे हरी क्रमियेला काळ…

असे काही अंशी दुख मुक्ताईच्या शब्दात दिसते. शिवाय त्यांच्या जीवनात अनेक प्रसंग घडलेले आहेत की मुक्ताबाईने आपल्या मोठ्या भावंडांनाही मार्गदर्शन केले आहे.

समाजातून सतत उपेक्षा, अपमान सहन न होऊन एक दिवस स्वतावरच चिडून ज्ञानोबा उद्विग्न होऊन, पर्णकुटिचे दार बंद करून आत ध्यानस्थ बसले. संन्याशाच्या पोराचे दर्शन घडले म्हणून मोठा अपशकुन झाला असे ज्ञानोबाला पाहून एकाने म्हटले, त्यामुळे ज्ञानोबा खिन्न झाले. निवृत्ती आणि सोपान यांनी ही विनवण्या केल्या. पण ज्ञाना दार उघडेना. मुक्ताबाईने विनवणी करूनही ते दार उघडेनात. छोट्याशा बहिणीने मुक्ताइने लडिवाळ पणे ज्ञानाला समजावले.ज्ञाना दादा चिडलाय, त्याची मनस्थिती बिघडली हे मुक्ता बाईंना लक्षात आले. ज्ञानोबा पेक्षा लहान असलेली मुक्ता आता त्यांना मोठ्या अधिकाराने मोठी होऊन समजवायला लागली. “लोक कितीही वाईट वागले तरी तुम्ही विचलित होऊ नका. आपला चांगला मार्ग सोडू नका. ताटी उघडा आता. या अवस्थेतून बाहेर या”. असं ममतेने सांगून ज्ञानेश्वरांचे मन वळवले. संतांची लक्षणे काय आहेत. योगी कसा असावा , आपले भूतलावरील अवतार कार्य काय आहे ते मुक्ता बाईंनी ताटीच्या अभंगात सांगितले आहे. ज्ञानोबांना जागृत केलं आहे.  

चिंता क्रोध मागे सारा

ताटी उघडा ज्ञानेश्वरा

.

योगी पावन मनाचा। साही अपराध जनाचा।

विश्व रागे झाले वन्हि। संते सुखे व्हावे पाणी।

.
शब्दशस्त्रे झाले क्लेश । संती मानावा उपदेश ।

विश्वपट ब्रह्मदोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा।

.

ब्रह्म जैसें तैशा परी आम्हा वडील भूतें सारी

अहो क्रोधें यावें कोठे अवघे आपण निघोटे

जीभ दातांनी चाविली कोणें बत्तीशी तोडीली

मन मारुनी उन्मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा

ज्ञानदेव दिवसेंदिवस जास्तच आत्ममग्न होत चालले आहेत हे मुक्ताबाईना जाणवते . या वेळी ज्ञानोबाचे मन शांत करण्याचा प्रयत्न मुक्ता बाई करते आणि स्वच्छ, सात्विक, पावन मनाच्या या योगी पुरुषाला तिच्या ज्ञानादादाला क्षणिक रागापासून परावृत्त करून त्याचे मन स्थिर करण्याचा प्रयत्न करते. आपल्या पेक्षा लहान असलेली लाडकी बहीण मुक्ताई आध्यात्मिक आणि ज्ञानाने ओतप्रेत भरलेली तिची प्रेमळ विनवणी ज्ञानोबा मान्य करतात, शांत होतात आणि पर्णकुटी चे दार /ताटी उघडून बाहेर येतात. मुळातच योगी असलेल्या, तत्व चिंतक असलेल्या ज्ञानदेवांनासुद्धा मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य या         चिमुकल्या मुक्ताबाईत होतं. याचा परिणाम ज्ञानेश्वरांवर झाला, ते कार्यप्रवृत्त झाले आणि नेवाशाला भावार्थ दीपिका च्या निर्मितीची सुरुवात झाली. मुक्ताबाईंचे ताटीचे ४२ अभंग प्रसिद्ध आहेत. त्यांनी हरिपाठाचे सुद्धा अभंग लिहिले आहेत.  

गुरु संत निवृत्तीनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्य ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई घडत होत्या. नाथ संप्रदायाची दीक्षा निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईंना आणि ज्ञानेश्वरांना पण दिली होती. त्यामुळे दोघे आता गुरुबंधु-भगिनी झाले होते, प्रेम, आदर, भक्ती, ज्ञान दोघांनाही बरोबरच मिळत राहिले. कधी कधी मनात आलेली शंका मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना विचारत असे, ते शंका निरसन करत. निवृत्तीनाथ तर आईवडिलांचेही प्रेम लहान भावंडांना देत होते. तिन्ही भाऊ तसे मुक्ता बाईंचे गुरु बंधुच होते. पण तिची जडण घडण चालू असताना ती न कळत्या वयापासून कुटुंबावर होणार्‍या आघता मुळे अनेक प्रसंगांना सामोरी गेली होती. तिच्या छोट्याशा आयुष्यात अनेक घटना तिच्यासमोर घडल्या होत्या. ‘शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी’ नुसार विठ्ठलपंत आणि रुक्मिणी बाईंची ही चारही मुले होती.

मुक्ताई ने योगी असलेल्या ज्ञानदेवांच्या व्यक्तिमत्वाचा वेध आपल्या अभंगातून घेतला आहे. मुक्ताईच्या मते ज्ञानेश्वर योगी, संत. साधू, विरक्त, ज्ञानी, सद्गुरू, परमेश्वर आणि जगद्गुरू होते. असे वर्णन त्या अभंगातून करतात. 

अशा अनेक घटना मुक्ता बाईंच्या आयुष्यात घडलेल्या दिसतात की, ज्यातून त्यांचा आध्यात्मिक अधिकार किती मोठा होता ते आपल्याला लक्षात येतं.यामुळेच मुक्ता बाई तेराव्या शतकातली संत परंपरेतली एक ‘स्त्री गुरु’ होऊन गेली हे कळतं. गुरु शिष्य परंपरेत तर वयाने लहान असलेली पण चांगदेवांची गुरु मुक्ताबाई होती.चांगदेवांना तिने पासष्टीचा अर्थ सांगितला.हा मुक्ताबाईंचा पहिला शिष्य.  

संत निवृत्तीनाथ मुक्ताईचे गुरु, गुरूंचे म्हणणे ती अजिबात खाली पडू देत नसे, एक दिवस त्यांनी मांडे खाण्याची इच्छा मुक्ताईला बोलून दाखविली. मुकताईने लगेच तयारी केली. कुंभारवाडयात ती मातीचे परळ /भांडे आणण्यासाठी गेली असता, वाटेत विसोबा चाटी भेटले. तिच्या हातातले परळ हिसकावून घेतले आणि फोडून टाकले. कुंभारवाडयात सर्वांना ताकीद दिली की हिला कुणीही परळ देऊ नये. निराश होऊन मुक्ताई घरी आली. आपण निवृत्तींनाथांची इच्छा पूर्ण करू शक्त नाही याचा तिला खेद वाटला. दु:ख झाले. तिचा उतरलेला चेहरा पाहून ज्ञानोबा मदतीला आला. त्या योग्याने आपला जठराग्नी योग शक्तीने पेटवला आणि मुक्ता बाईंना सांगितले, “भाज आता पाठीवर मांडे” .

मुक्ताबाई आता कशी मांडे करते हे पाहायला विसोबा आलाच. उलट फजिती न होता मुक्ताबाईने मांडे भाजले होते हे पाहून विसोबा आश्चर्य चकित झाला. ही भावंडे असामान्य आहेत  हे समजले . स्वत:ची चूक उमगली. आपल्याला प्रायश्चित्त मिळाले पाहिजे मगच आपला उद्धार होईल असे म्हणून तो त्यांचे उष्टे अन्न खाऊ लागला. ते पाहून,मुक्ताबाईने “विसोबा तू खेचरा प्रमाणे उष्टे का खातोस?” असे विचारले. आणि या प्रसंगानंतर विसोबा मुक्ताबाईंचे शिष्य झाले. अशी आख्यायिका आहे. अशाच प्रकारे संत नामदेव यांना ही गुरु चे महत्व पटवून देऊन गुरुशिवाय तुला मोक्षप्राप्ती होणार नाही असे निर्भीडपणे सांगितले.

तीर्थ यात्रेहून परतलेल्या ज्ञानेश्वरांची भेट घेतली आणि पुढे मुक्ताबाईनी आपला भाऊ ज्ञानेश्वर याची समाधी पाहिली.महिन्याभरातच  सासवडला सोपान आणि वटेश्वरांची समाधी पाहिली. पुणतांब्याला चांगदेवांची समाधी पाहिली.आपल्या बंधूंप्रमाणेच आपल्या शिष्याच्या,चांगदेवाच्या समाधीचा सोहळा व्हावा असे निवृत्तींनाथांना व सर्व संतांना मुक्ताई ने सांगितले. त्यांचीहि अवतार समाप्ती झाली.  आईवडीलांच्या छत्रा नंतर या भावांनीच तिला सांभाळले होते. जिवापाड प्रेम केले होते. त्यामुळे या दोघांची समाधी तिला सहन होणारी नव्हतीच.या सगळ्या घटनांनंतर मुक्ताबाई आणखीनच विरक्त झाली. उदासीन झाली. मुक्ताबाई, निवृत्ती आणि इतर संतांबरोबर वेरूळ. घृष्णेश्वर करत, वैशाख वद्य द्वादशीला तापी काठावर, मेहुण या गावी आली. नदीवर स्नानासाठी गेले असताना अचानक वीज कडाडली आणि मुक्ताबाई कुणाला काही कळायच्या आत अंतर्धान पावली. निवृत्तींनाथ मुक्ताबाईना खूप जपत होते,तरी हे असे कसे झाले, मुक्ताई कुठेच दिसत नाही ? क्षणात त्यांनी ओळखले की ही अवतार समाप्ती आहे.

ऐकावा हा अर्थ  मुक्ताईच्या मुखी, आता ऐसी सखी नाही कोणी ||

निवृत्तीनाथ मुक्ताई सोडून गेल्यावर जो मनात आकांत झाला त्यावेळी हे म्हणतात. मुक्ताई ही मोठ्या भावांची छोटी आई तर होतीच पण त्यांची एक चांगली मैत्रीण, सखी पण होती. आता अशी मैत्रीण त्यांना शोधूनही सापडणार नव्हती.   

संत नामदेवांनी पण तिची अवतार समाप्ती अनुभवली आणि त्याचे वर्णन केले आहे ते म्हणतात-             

कडाडली वीज निरंजनी जेव्हा l

मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली l

वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई l

झाली मुक्ताबाई स्वरुपाकार l

एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी l

जेव्हा निरंजनी गुप्त झाली l

गेले निवारुनी आकाश आभुट l

नाम म्हणे कोठे मुक्ताबाई l

संत जनाबाईंनी आदराने म्हटले आहे , “आदिशक्ती मुक्ताबाई | दासी जनी लागे पायी ||”!

अशी ही आदिशक्ती मुक्ताबाई !

 

ले- डॉ. नयना कासखेडीकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डब्यातील डबे… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🌸 विविधा 🌸

☆ डब्यातील डबे… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आज सकाळी मसाल्याचा डबा घासायला काढला आणि त्याकडे बघतच राहिले.कारण आपली महिलांची सवय!डब्यावरचे नाव वाचले,विशेष म्हणजे बाहेरच्या डब्यावर व आतील छोट्या डबीवर नाव वेगळे.मग डब्याकडेच बघत बसले आणि हळूच आठवणीची एक पुडी सुटली.बाहेरचा डबा मैत्रिणीने दिलेला तर आतील छोटे डबे माझ्या जुन्या डब्यातील होते,जो डबा पूर्वी चिरल्यामुळे मोडीत काढला होता.मग लक्षात आले महिलांचा जीव कुठे कुठे अडकलेला असतो.

अगदी आजचे उदाहरण बघायचे झाले तर डबे घरात बघितले तर किती विविध प्रकारचे डबे सांभाळून ठेवलेले असतात.आई कडे असतो तो पर्यंत याचे महत्व लक्षात येत नाही. पण एकदा स्वतः च्या संसाराला सुरुवात झाली की या डब्यात जीव अडकणे सुरु होते.लग्नात आहेरात आलेले डबे अगदी कायमची सोबत करतात.विविध आकाराचे डबे अगदी व्यवस्थित लावून ठेवणे,दर महिन्याला घासून चकचकित ठेवणे.घासून मगच त्यात सामान भरणे.व्यवस्थित साहित्य सापडावे म्हणून त्यावर छान स्टिकर्स लावणे.अशी उत्तम गृहिणीची कामे सुरु होतात.आणि त्या कामाचे सर्वांकडून कौतुक पण होते.अर्थात लेबल असलेल्या डब्यात तोच पदार्थ असेल याची मात्र खात्री नसते.आणि कोणी शेंगदाणे कुठे आहेत? याच्या उत्तरा दाखल “आहेत ना तिथेच,रवा लिहिलेल्या डब्यात.” हे वाक्य ऐकू येते.काय करणार,तात्पुरती सोय केलेली असते.पण कोणाला समजणार?

काही मैत्रिणी तर डब्यांच्या समोर मुद्दाम सेल्फी काढून आपले वैभव दाखवत असतात.पूर्वी तर किचन मधील एक भिंत म्हणजे डब्यांची मांडणी असायची.आणि त्यात चढत्या किंवा उतरत्या डब्यांच्या उंचीच्या क्रमाने डबे लावलेले असायचे.जणू किचनचे वैभवच!

हळूहळू  हळदीकुंकू, मिळालेले आहेर,भेटवस्तू अशा प्रसंगातून छोट्या,मोठ्या,विविध आकाराच्या,रंगाच्या डब्यांची बहीण,भावंडे घरात येतात आणि ऐटीत जुन्या डब्यांच्या समोर किंवा डोक्यावर जाऊन बसतात.त्यात अगदी सध्याच्या पार्सल मध्ये येणारे डबे पण अपवाद नसतात.अगदी टाकून द्यावेसे वाटले तरी “असू दे, वेळेला उपयोगी पडतील.” असे म्हणून ठेवले जातात.इतके डबे असून एखादा डबा  आला नाही तर जीव हळहळतो.आणि दुकाना समोरून जाताना एखादा नवीन फॅशनचा डबा भुरळ घालतोच!

आणि हो आपला जीव अडकलेले डबे घरातल्यांच्या मात्र डोळ्यात खुपत असतात.मग मी एक युक्तीच केली आहे.एक बॉक्स घेऊन त्यात हे डबे छान ठेवले आहेत.काही दिवसांनी मात्र हे डबे त्यात मावत नाहीत.मग मी डबे एकात एक असे घालून जपून ठेवते.आणि छोट्या छोट्या डब्या मोठ्या डब्यांच्या पोटात लपून बसतात. अगदी कोणाची दृष्ट नको लागायला या तत्वाने!अजून एक गंमत सांगू का? हे झाले निवडक डब्यांचे अजून आठवणींचे डबे उघडलेच नाहीत.म्हणजे लहानपणीचे,आज्जीचे,कड्या कुलुपे असणारे,विविध घाटांचे ( आकार ).

आणि हो या डब्यांच्या  मध्ये यांच्या बहिणी बरण्या राहूनच गेल्या आहेत.बरण्यांची गोष्ट पुन्हा केव्हातरी!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

११/१०/२०२३

हिलिंग, मेडिटेशन मास्टर, समुपदेशक.

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बुद्धांनी देवत्व का नाकारले ?… ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

🌳 विविधा 🌳

☆ बुद्धांनी देवत्व  का नाकारले ?… ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

बुद्धांनी देवत्व का नाकारले ?

सामान्य लोक महापुरूषाच्या अंगात दैवी शक्ती आहे असे मानून त्यांच्या निस्पृहतेच्या कठिण मार्गावर चालण्याच्या खडतर कामापासून स्वतःला सोईस्कर रित्या दूर करून टाकतात. म्हणूनच बुद्धांनी देवत्वच नाकरले. बुद्धांनी अनुयायांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याशिवाय पर्याय शिल्लक ठेवला नाही. “बुद्ध देव होते. त्यांना जे जमले ते आपल्याला कसे जमेल?” असे बोलायची सोय ठेवली नाही.

आपल्या प्रत्येक समस्येला आपली हाव आणि आळस जबाबदार असताना ते खापर दुसऱ्या कुणाच्या तरी माथी मारून त्यांचा तिरस्कार करणे ही बहुतेक सामान्य माणसांची सहज प्रवृत्ती असते. पण असे का होते?

या जगात काहीही परिपूर्णपणे चांगले नाही. शोधले तर रामात-बुद्धातही दुर्गुण सापडतात. तसेच काही महाभागांनी रावणात आणि म्हैशासुरातही सद्गुण शोधून काढलेले आहेतच. आपण तर सामान्य लोक आहोत. आपण स्वतः परिपूर्णपणे चांगले नसताना जगाकडून परिपूर्णतेची अपेक्षा ठेवणेच मुळात चुकीचे आहे. तरी पण आपल्या वाट्याला आलेली प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असावी अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. अपेक्षित गोष्टी जागेवर उपस्थित असतील तर त्याचे कुणाला फारसे कौतुक वाटत नाही. उदा. जेवणात योग्य प्रमाणात मीठ पडले तर त्याचे कुणी कौतुक करत नाही. तसाच नव-याचा निर्वसणी असणे हा वाखाणण्याजोगा गुणही ब-याच वेळा दुर्लक्षिलाच जातो.

आपल्या वाट्याला आलेल्या गोष्टींमध्ये काही अपरिपुर्णता आली तर तो मात्र अनपेक्षित धक्का असतो. उदा.  नेहमी सुग्रण होणाऱ्या जेवणात मीठ कमी वा जास्त पडले. निर्व्यसनी नवरा झिंगत घरी आला. असे नकारात्मक प्रसंग अनपेक्षितरित्या धक्कादायक असल्याने मेंदूत खोलवर नोंदले जातात. अशा तणाव निर्माण करणाऱ्या नकारात्मक गोष्टी परत घडू नये म्हणून अशा गहन चिंतन चालू होते. म्हणजे आपण नकारात्मक गोष्टींचाच विचार करत बसतो. आयुष्यातील सर्व चांगल्या सकारात्मक गोष्टी  अपेक्षित असल्याने दुर्लक्षित राहतात तर प्रत्येक नकारात्मक गोष्टींवर गहन चिंतन होते. अशा प्रकारे बहुतेक व्यक्तीचे बहुतांश विचार नकारात्मक असतात.

आजुबाजूला घडणाऱ्या अनपेक्षित गोष्टी आणि अपेक्षांचा सरळ संबध आहे. जितक्या आपल्या अपेक्षा मोठ्या तितके अनपेक्षित नकारात्मक गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागते. तितके जास्त नकारात्मक विचार चिंतन चालू होते. तितके दुःख मोठे होत जाते.

जगात आपल्यासहित काहीच परिपुर्ण नाही. आपल्या वाट्याला आलेल्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्थां यामधील केवळ सकारात्मक गोष्टी पाहिल्या तर मन आनंदी आणि समाधानी होते. याऊलट  यातील केवळ नकारात्मक गोष्टी पाहिल्या तर मन दुःखी आणि असमाधानी होते. 

स्वतःला दुःखी करणारे आत्मघाती नकारात्मक विचार करणारे लोक आता स्वतःच्या मनात खदखदणा-या दुःखाच्या वड्याचं तेल काढायला बाहेर वांगे शोधतात. त्यातून मनात जन्माला येतो राग, तिरस्कार आणि ईर्षा. असे मन एक प्रकारे कचरापेटी होते. दुर्देवाने कचरापेटीला सर्वात जास्त त्रास कच-याचाच होत असतो. रागाचा सर्वात जास्त त्रास कुणाला होतो?  राग, तिरस्कार वा इर्षा या दुःखद भावना आपल्याच मनाला दुःखी करतात.

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर, पाटिल हॉस्पिटल, सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवरात्र विशेष लेख – नवरात्र महोत्सव… एक सृजन ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

?  विविधा ?

☆ नवरात्र विशेष लेख – नवरात्र महोत्सव… एक सृजन ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

आज नवरात्र महोत्सवाचे निमित्ताने  एक सुंदर विषय चर्चेत  आला आहे.  आपण  सर्वजण  या  बदलत्या  काळाचे प्रतिनिधीत्व करतो  आहोत.  केवळ  उलट सुलट विचार,  विधाने करून आपण  श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील तफावत वाढवीत  आहोत.

नवरात्रीचे धार्मिक महत्त्व समजून घेताना  आपण स्वतः धार्मिक  आहोत का? याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. हिंदू धर्माव्यतिरिक्त अन्य कोणत्याही धर्मात सण,  उत्सव, परंपरा यांची टिंगल,  टिका केली जात नाही.  आज केवळ आपले नाव चर्चेत यावे म्हणून  धार्मिक कर्मकांडावर टिका करणारे लेखक  घरात मात्र नाना देव पूजताना दिसतात. 

नवरात्र उत्सव हा भक्ती, शक्ती आणि  आराध्याविषयी स्नेहभाव व्यक्त करण्याचा  उत्सव  आहे.  असुर, समाज विघातक मनोवृत्तीचा विनाश,  विवेकाचा  अंकुश, आणि  सद्सद विवेक बुद्धीने षडरिपूंना दिलेला शह म्हणजे नवरात्र उत्सव.

धार्मिकता  आणि  कार्यप्रवणता यामध्ये  श्रद्धा ,  भक्ती  आणि निस्वार्थी सेवाभाव  यांचा समावेश झाला कि आपण  हा उत्सव  ख-या अर्थाने आनंदोत्सव म्हणून साजरा करू शकतो.

नारीशक्ती ही सृजनशीलता  आणि लक्ष्मी प्राप्तीचे प्रतिक मानली गेली आहे.  नर  आणि  नारी  यांच्यातील  एक काना आणि  एक वेलांटीचा फरक  फार मोठे समाज प्रबोधन घडवणारा आहे.  वास्तविक पहाता  नर,  नारी यांची कार्यशक्ती समान  असली तरी समाजमन त्यात पुरूष प्रधान संस्कृती  अबाधित रहावी म्हणून  काही बंधने  स्त्रियांवर युगानुयुगे लादत आले आहे.  तू माझी, मी  तुझा  हे  मानव्याचे बोधवाक्य  स्त्री पुरूष  एकत्र वावरताना संशयाच्या भोव-यात सापडते.  आपण  आपल्या  अंतर्मनातील काही सुप्त कलागुण  जागृत ठेवण्यासाठी देवापुढे  अखंड नंदादीप,  धान्य पेरणी,  आणि सुमनांची माला  अर्पण करीत आहोत.

विविधतेतून एकता हे  ब्रीदवाक्य जोपासणारे -या आपल्या  भारत देशात प्रादेशिक स्तरावर विविधता येणारच.  उत्सव साजरा करताना  चालिरिती भिन्न  असल्या तरी,  कौटुंबिक सलोखा,  सामंजस्य,  सुख, शांती, समाधान,  आणि सेवा भावी मानव धर्म जोपासणारी शिकवण  सर्वत्र एकच  आहे.  नवरात्र  उत्सवात देवीने परीधान केलेल्या  साड्या,  तिचे वाहन, परीधान केलेले अलंकार,  अर्पण केलेले नैवेद्य, हातातील शस्त्रे  आपणास  अंधश्रद्धेपासून परावृत्त करून समस्त मानव जातीच्या कल्याण्यासाठी आदिमाया आदिशक्ती  कशी  जागृत  आहे याचीच प्रचिती देते.

सारे माझे पण मी सर्वांची  ही शिकवण देणारा  हा  आनंदोत्सव  आहे. यामध्ये  जरूर  काही समाजात अंधश्रद्धा जोपासल्या जात आहेत.  काही  धार्मिक बाबींचे अवडंबर माजवले जात आहे.  एक फुल  श्रद्धेने अर्पण  केले काय  अन लाखभर फुले अर्पण केली काय? शेवटी भाव अत्यंत महत्त्वाचा आहे.  तीच गोष्ट खण,नारळ,  ओटी,  नैवेद्य यांच्या बाबतीत लागू होते. म्हणून  धार्मिक विधी करताना  आलेला यथाशक्ती  हा  शब्द  अत्यंत महत्त्वाचा आहे. या पद्धतीने मातामयी देवतेची  आराधना या  उत्सवात  अपेक्षित आहे.

गरबा खेऴणे म्हणजे काय ? हे जर  आपण शोधले तर गरबा (आपल्या भाशेत मडके )हे ब्रम्हांडाचे प्रतिक आहे.गरब्याला ( मडक्याला ) २७ छिद्र असतात.९ छिद्रांचि १ अशा ३ लाईन असतात

९ गुणिले ३ = २७ नक्षत्रे होत. १  नक्षत्र म्हणजे ४ चरण होय.२७ गुणिले ४ = १०८.नवरात्रात गरबा ( मडके ) मध्यभागि ठेवुन त्या भोवति १०८ वेळा गोल फेरा धराय़चा असतो.त्यामुळे आपल्याला ब्रम्हांडाची प्रदक्षिणा घातल्याचे पुण्य मिऴते अशा १०८ प्रदक्षिणा घातल्या जातात.

हेच खरे गरबा खेळण्याचे महात्म्य  होय. अशी पौराणिक माहिती संकलित आहे.

उत्पत्ती,  स्थिती,  आणि  लय.  हे  नितीतत्व जोपासणा-या देवता  म्हणजे  सरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली या  आहेत. या  तिनही देवतेची भूत,  भविष्य  आणि वर्तमानातील  शक्तीरूपे आपण नवदुर्गा म्हणून  संबोधित करतो.  वर्तमानातील नारीशक्ती तिचा  आदर सन्मान  हा  दृष्टिकोन ठेवून नवरात्र उत्सव साजरा व्हावा  असे मला वाटते.

स्वतःचे महत्व प्रस्थापित करण्यासाठी समाजात   श्रद्धाळू लोकांना भय दाखवून  अंधश्रद्धा निर्माण केल्या जातात.  कौटुंबिक सौख्याचा विचार करून भोळी भाबडी जनता याला  बळी पडते.  वास्तविक पाहता देवीची जी वाहने  आहेत ती सर्व  वाहने  म्हणजे  हत्येपासून त्यांना देवीने , आदिशक्तीने दिलेले  अभय  आहे. तरीदेखील कोंबडी,  बकरू यांची निष्कारण कत्तल होत आहे.  भूतदया,परोपकार  आणि  अध्यात्मिक  उन्नती हा  या  नवरात्रीचा मुख्य  उद्देश आहे.

राजस,  तामस,  आणि  सात्विक  गुणांचा  समतोल आचारात ,  विचारात आणि  श्रद्धेत कसा जोपासायचा हे शिकवणारा हा  उत्सव  आहे. माणूस कितीही बदलला तरी माणसाला माणसाची गरज लागतेच. हा माणूस कसा ओळखायचा? कसा  टिकवून ठेवायचा?  आणि त्याच्या तील दुर्गुण कसा  नष्ट करायचा हे शिकवणारा हा  नवरात्र  उत्सव  आहे.

केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून जर नवरात्र महोत्सव साजरा केला जात  असेल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे.  माणूस  आपला  आहे.  आपण माणूस  आहोत. माणसात देव शोधायचा त्याची उपासना करायची  इतका  साधा सोपा संदेश नवरात्र महोत्सवाने दिला आहे.  आपण त्याचा कसा  उपयोग करतो हे  आपल्याच हातात आहे.

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शाश्वत की अशाश्वत!!! ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

शाश्वत की अशाश्वत!!! ☆ सौ.मंजिरी येडूरकर

पहाटेच्या हळूवार स्पर्शानं सकाळ जागी झाली होती. सूर्य किरणांची लगबग संपून ते स्थिरावले होते. कुठं धुणं धुतल्याचे आवाज तर कुठे भांडयांचा खणखणाट ऐकू येत होता. कुठे ‘‘ दिपे, पाणी काढलंय आंघोळीला जा,’’ अशा हाका, कुणी दोन्ही खांद्यावर पदर घेऊन हातात किटली घेऊन दूध आणायला चाललं होतं. कुणी लगबगीनं नोकरीचं ठिकाण गाठायला निघालं होतं.

सगळं कसं रोजच्या सारखं चाललं होतं. कुठे कुणी अडखळत नव्हतं कि चाचरत नव्हतं. जणू काल काही घडलचं नव्हतं. कालचा दिवस यांच्या आयुष्यात उगवलाच नव्हता. सगळे जगतायत. कां? प्रत्येकाकडं कारण आहे,  जगण्याचं! स्वतःसाठी, स्वतः निर्माण केलेलं! कुणाला खूप मोठं व्हायचयं, कुणाला खूप पैसा मिळवायचाय, कुणाला छान संसार थाटायचाय, कुणाला मुलांना मोठ्ठ करायचंय, कुणाला मुलांची लग्न करायचीत, कुणाला नातवंडं पहायचीत, तर कुणाला त्यांची लग्नं….सारं न संपणारं! सा-या मनाच्या समजुती. अन् असं मनाला पटण्याजोगं कारण नसेल ना तर “आत्महत्या करणं म्हणजे भ्याडपणा आहे. संकटांना निधडया छातीनं सामोरं जायला हवं, जीवनाचा क्षण न् क्षण वेचला पाहिजे. त्यातून आनंद मिळवला पाहिजे.” असं अगदी राणी लक्ष्मीचा आव आणून सांगतील. पुळचट! स्वतः पुळचट  असतात. आत्महत्या करण्याचं धाडस नसतं आणि ते दाखविणा-याला भ्याड म्हणतात.

 पण खरंच! आयुष्यात कांहीतरी करून दाखविण्याची धमक असणारे किती निघणार? हाताच्या बोटावर मोजता येण्याजोगे! बाकी सगळे सामान्य अतिसामान्य! संसाराच्या चौकटीत रमणारे. मग सगळेच जर तसे धाडसी असते तर काय झालं असतं? सगळा समाज विस्कळीत झाला असता. त्यांना एकत्र बांधणारा कांही दुवाच राहीला नसता. कुठे कांही लागेबांधेच राहिले नसते. कुठं कुणासाठी अश्रुच वाहिले नसते. सगळं कसं अशाश्वत झालं असतं.

अशाश्वत? अशाश्वत झालं असतं, म्हणजे आता सगळं शाश्वत आहे? आहे तर काय! सगळं शाश्वत आहे. म्हणून तर कुणी उद्यासाठी घर बांधतय, कुणी पैसा साठवतंय, कुणी दागिने करतंय. प्रत्येकजण उद्यासाठी जगतोय. उद्याच्या स्वप्नांसाठी! स्वप्नांच्या पूर्ततेचा आनंद लुटण्यासाठी! पण खरंच जर सगळं अगदी अशाश्वत असतं नां, तर एक मात्र चांगलं झालं असतं. प्रत्येकजण वर्तमानातला प्रत्येक क्षण न् क्षण जगला असता अगदी अधाशासारखा! स्वच्छ, पारदर्शक, निर्भेळ, निरपेक्ष जगला असता. या शाश्वतामुळं जगण्यावरच मळभ साठलंय. कुणी जगत नाहीय, आपोआप जगले जातायत. कुजणारं स्वत्व आणि त्यावर वाढणा-या स्वार्थाच्या आळयांच्या बुजबुजाटात !

अशाश्वताने आपलं अस्तित्व दाखविण्यासाठीच  कालचा  नंगा नाच केला असावा. शाळेला म्हणून घराबाहेर पडलेली मुलं परतलीच नाहीत. त्यांचे आई बाप हा नियतीचा क्रूर खेळ पहात बसलेत. अशाश्वताच्या विळख्यानं गुदमरत! आपल्या आसपास मात्र सगळं शाश्वत आहे. जणू, काल टी.व्ही. वर दाखवलेला मुलांच्या पालकांचा आक्रोश यांच्या कानापर्यंत पोचलाच नाही. सगळयांची उद्याची आखणी, उद्याची जुळवाजुळव सुरू झाली आहे.

मगं खरं काय आहे? शाश्वत की अशाश्वत? कां अशाश्वताच्या धुक्यातून चाचपडत वाट काढू पहाणारं, पैलतीराचं मृगजळ दाखवणारं शाश्वत! कि शाश्वतावर आरूढ होवून त्याला हवं तसं दौडू देणारं पण लगाम मात्र आपल्या हातात ठेवणारं अशाश्वत!

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares