मराठी साहित्य – विविधा ☆ स्वातंत्र्य 🇮🇳 ☆ सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

🌳 विविधा 🌳

☆ स्वातंत्र्य 🇮🇳 ☆ सौ. विद्या पराडकर ☆

भारताचा स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!💐 

स्वातंत्र्याच्या ‌निर्मात्यांना आमुचे लाख प्रणाम💐

 

७६‌ वर्षे झालीत

पण  स्वातंत्र्य मिळाले कुणाला?🌸

या देशातील सामान्य नागरिक

 स्वातंत्र्यापासून वंचितच राहिला ☘️

 

स्वातंत्र्य वीरांच्या बलिदानाचा पायावर

ज्यांनी आपल्या इमारती‌ बांधल्या

त्यांना स्वातंत्र्य उपभोगण्यास मिळाले

बाकीचे मात्र कोरडेच राहिले.🌸

 

स्वातंत्र्य सूर्याची किरणे शिरली

मोठमोठ्या बंगल्यात, महालात

पण झोपड्या अन् घरे मात्र

राहिलीत नेहमीच अंधारात 🌸

 

आपण सारे हिंदुस्तान निवासी

म्हणतात सारे तोंडाने

स्वार्थापोटी ‌हेच निवासी

हेच निवासी एकमेकांचे शत्रू होतात

कृतीने

या देशात आहे निस्वार्थी

म्हणून च‌ इतरांचा स्वार्थ साधतो

देशभक्त आहेत

म्हणूनच देशद्रोही सुखी आहेत.☘️

 

स्वातंत्र्य, समता, बंधुता

सारे काही सोंग आहे

स्वतंत्रतेच्या मात्र पायात

विषमतेची श्रुंखलाआहे☘️

 

खरी लोकशाही आहे अर्थहीन

सुरु आहे बेबंदशाही चे थैमान

चंगळ वादाला आला बहर

पतन होते लोकशाहीचे, नागरिकांचे

सर्व राजकीय पक्षांचे🌸

 

करण्या यशस्वी लोकशाही

घ्या हो शपथ राष्ट्रीय एकात्मतेची

होळी करा हो सत्तांध भावनेची

स्वातंत्र्याचा अखंड दीप गवसेल तेव्हा 🌸

© सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वदेशीचा जादू… भाग – ६ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ स्वदेशीचा जादू… भाग – ६ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे  

समृद्ध प्राचीन वारसा – ग्रामीण उद्योग

सोपानराव मुलांना आपल्या गावात फेरफटका मारून आणत होते. श्यामराव आणि श्यामलाताई सोबत होत्याच. रामू लोहाराचे काम पाहून ते खाली उतरत असताना श्यामराव गमतीने पिंकी आणि राजेशला म्हणाले, ‘ हे लोहाराचे काम पाहताना मला लहानपणी शिकलेल्या दोन म्हणी आठवल्या बरं का ? ‘

‘श्यामराव, आम्हाला पण जरा कळू द्या की तुम्हाला काय आठवलं ते ? हसत हसत सोपानराव म्हणाले.

‘अरे श्याम, आपल्या वर्गाला त्या भागवत बाई मराठी शिकवायच्या, त्या आठवतात का ? ‘

‘व्हय की. चांगल्या लक्षात हायेत त्या. मला शुद्धलेखन चुकले म्हणून त्यांनी दररोज दहा ओळी शुद्धलेखन लिहून आणायला सांगितलं होतं. आणि नाही लिहून आणलं तर त्या शिक्षा करायच्या. ‘

‘पण सोपान अजूनही भागवत बाई भेटल्या तर तुला शुद्धलेखनावरून शिक्षा करतील बरं ! ‘ श्यामरावांनी असं म्हणताच हास्याचा स्फोट झाला. सगळेच त्यात सामील झाले.

‘हां, तर मला आठवल्या त्या म्हणी त्यांनी सांगितलेल्या. भागवत बाई म्हणायच्या, ‘ संस्कार आणि परिस्थिती माणसाला घडवते. मुशीत जसे सोने उजळून निघते, तसाच परिस्थितीमुळे माणूस. रामू लोहाराच्या भट्टीत लोखंड जसं तावून सुलाखून निघालं. ‘ श्यामराव म्हणाले.

अरे वा, एकदम बरोबर. ‘ सोपानराव म्हणाले. आणि दुसरी म्हण कोणती आठवली बाबा तुला ? ‘

‘अरे सोपान, आपण कधी सोनाराकडे गेलो तर तो आपल्या छोट्याशा हातोडीचे फटके दागिने घडवताना मारताना आपल्याला दिसतो. पण आता पाहिले ना रामू लोहाराकडे. त्याच्याकडे मोठा घण आहे. सोनाराच्या हातोडीचे शंभर फटके आणि याचा एकच दणका बरोबर नाही का ? म्हणून सौ सुनार की और एक लोहार की ही म्हण आठवली. ‘

‘बरोबर आहे मित्रा ‘ सोपानराव म्हणाले.

‘बाबा, आम्हीही या म्हणी ऐकल्या होत्या पण त्याचा अर्थ आम्हाला आता स्पष्ट झाला. ‘ पिंकी म्हणाली.

सगळे रामूच्या ओट्यावरून खाली उतरले आणि पुढे निघाले. काही अंतरावर एक मुलगा आणि एक मुलगी हातात एक फिरकी आणि आकडा घेऊन एक लांबच लांब दोरी फिरवत होते. ती मुलं साधारणपणे राजेश आणि पिंकीच्याच वयाची होती.

राजेश म्हणाला, ‘ बाबा, ही मुलं काही खेळ खेळताहेत का ? ‘

सोपानरावांना हसू आले, ‘ अरे पोरांनो, हा खेळ नाही. त्यांना बिचाऱ्यांना आपलं पोट भरण्यासाठी हा उद्योग करावा लागतो. ही मुलं दोर तयार करत आहेत. दोरी, दोरखंड असं ते तयार करतात. मग त्यांचे आईवडील शेजारच्या गावांमध्ये ज्या दिवशी आठवडे बाजार असेल त्या दिवशी विक्रीसाठी घेऊन जातात. फार मेहनत आणि चिकाटी आहे त्यामागे. ‘

‘अच्छा काका. म्हणजे अशा प्रकारे दोर तयार करतात तर ! आम्ही कधी पाहिले नव्हते. कशापासून बनवतात ते दोर ? ‘ पिंकीनं विचारलं.

‘तसं तर अनेक वस्तूंपासून दोर तयार करतात. म्हणजे गवत, ताग, कपाशी, लव्हाळे, काथ्या यासारख्या वस्तू वापरल्या जातात. पण आमच्या इथे जवळच मोठं जंगल आहे शिवाय शेती आहे. शेतीच्या बांधावर आणि जंगलात घायपात नावाची वनस्पती उगवते. तिच्यापासून दोर करतात. घायपातला घायाळ, केकती अशी पण नावं आहेत. पण आता या बिचाऱ्यांचा व्यवसाय कमी झाला आहे. लोक त्यांच्याजवळून दोर विकत घेण्यापेक्षा शहरातील दुकानांमध्ये जाऊन माल विकत घेणे पसंत करतात. त्यामुळे असे दोरखंड तयार करणारे कारागीर आता ग्रामीण भागात फार कमी आहेत. ‘

‘काका, किती छान आणि नवीन माहिती मिळाली आम्हाला !’ राजेश म्हणाला.

‘चला, आता आपण जरा दुसरीकडे जाऊ. मी येथील कुंभार आळीत तुम्हाला नेतो. ‘ सोपानकाका म्हणाले. जवळच्या एका बोळातून ते सगळे मग कुंभार आळीत शिरले. त्या आळीत तीनचार कुंभारांची घरे होती. काही घरांच्या बाहेर माठ रचून ठेवले होते. काही ठिकाणी पाणी भरण्याचे मोठे रांजण होते. कुठे कुठे मातीच्या चुली दिसत होत्या. विविध प्रकारची मातीची भांडी होती. पोळ्यासाठी लागतील म्हणून मातीचे बैल तयार करून त्यांना रंग देणे काही ठिकाणी सुरु होते. एका ठिकाणी एक कुंभार बाबा एका चाकावर झाडांसाठी लागणाऱ्या मातीच्या कुंड्या तयार करताना दिसत होते. ‘

‘रामराम हरिभाऊ. पाहुण्यांना घेऊन आलो तुमच्याकडे. ‘ सोपानराव कुंभार बाबाना म्हणाले.

‘या की मग. पाव्हणं कुठलं म्हणायचं ? हरिभाऊ म्हणाले.

‘हरिभाऊ, हा माझा बालमित्र श्याम. या वहिनी आणि ही त्यांची मुलं पिंकी आणि राजेश. शहरातून आलेत आपला गाव पाहायला. ‘ सोपानराव म्हणाले. ‘ या मुलांना जरा तुमच्या कामाची माहिती सांगा. ‘

आपल्याला कोणीतरी काही विचारते आहे याचा आनंद होऊन हरिभाऊंची कळी खुलली. ते मोठ्या उत्साहाने सांगू लागले.

‘ बाळांनो, या कामासाठी आम्ही लई पारखून माती आणतो बरं का ! नदीकाठची किंवा तलावाकाठची माती लागते. त्या मातीला गाळून, वाळवून मग तिच्यात लीद, गवत, शेण, राख, धान्याची फोलपटे यासारख्या गोष्टी मिसळतो. मग ती चांगल्या प्रकारे मुरू देतो. त्यानंतर तिचे गोळे बनवून मग त्याच्या वस्तू घडवतो. हे चाक, यावर आम्ही वस्तुंना आकार देतो. आता तुम्ही ते पाहताच आहात. त्याशिवाय हा एक दगड आहे. त्याला आम्ही गंडा किंवा गुंडा म्हणतो. त्यामुळे वस्तूला गुळगुळीत आकार येतो. ही एक लाकडी थोपटणी, तिला आम्ही चोपणी म्हणतो. वस्तू तयार करताना तिला बाहेरून आम्ही याच्याने थोपटतो. तयार झालेल्या वस्तू आम्ही ज्या भट्टीत भाजतो, तिला आवा म्हणतात. ‘

‘ पोरांनो, आता आमचा धंदा पूर्वीसारखा राहिला नाही. मातीच्या वस्तू लोक कमी विकत घेतात. पण तुम्हाला म्हणून सांगतो. पूर्वी स्वयंपाकासाठी मातीचीच भांडी वापरली जायची. गोरगरिबांच्या घरात स्वयंपाक त्यांच्यावर व्हायचा. पण आता स्टील, अल्युमिनियम यांची भांडी आली. लोकं तीच घेत्यात पण आरोग्यासाठी मातीचीच भांडी चांगली. त्यात पोषक घटक बी असत्यात आन स्वयंपाकाला लई ब्येस चव येते बघा. आणि चुलीवरच्या जेवणाची टेस्ट बी लई न्यारी असतीया. ‘ हरिभाऊ उत्साहाने बोलत होते. बोलता बोलता एकीकडे त्यांचे कामही सुरु होते.

त्यांच्या हातातील ती कला पाहून राजेश आणि पिंकीला आश्चर्य वाटले. ती दोघेही बराच वेळ त्याचं निरीक्षण करत उभी राहिली. ‘ एकाच प्रकारच्या मातीतून माठ, रांजण, कुंड्या, पणत्या, चुली आदी वस्तू घडत होत्या. ओल्या मातीला हवा तसा आकार देता येतो. त्यातून काय निर्माण करायचे ते आपण ठरवायचे असते. मग भट्टीत भाजली की ती पक्की होतात. मानवी जीवनाला सुद्धा या गोष्टी किती चपखल लागू पडतात, नाही ? ‘ असे विचार श्यामरावांच्या मनात येऊन गेले. श्यामलाताई मनातल्या मनात ‘ फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार ‘ हे गाणं गुणगुणत होत्या. या विश्वाची निर्मिती करणारा परमेश्वरही जणू एक कुंभारच ! तो तर किती वेगवेगळ्या प्रकारे या जगाला आकार देतो, किती वेगवेगळ्या प्रकारचा निसर्ग, माणसे, प्राणी निर्माण करतो. असे विचार त्यांच्या मनात तरळून गेले.

पुढे गेल्यानंतर एका गल्लीत सुतार लोकांनी लाकडापासून केलेल्या काही वस्तू मुलांना बघायला मिळाल्या. अशा प्रकारे खेडेगावातील लोकांचे उद्योग प्रत्यक्ष कसे चालतात ते मुलांना बघायला मिळाले. मुले या सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्याने बेहद्द खुश होती. आता संध्याकाळ झाली होती. सूर्यनारायण निरोप घेण्याच्या तयारीत होते. श्यामराव सोपानला म्हणाले, ‘ सोपानराव, आता आम्हाला निघण्याची परवानगी द्या. मुले पण थकली आहेत. घरी जाऊन विश्रांती घेऊ. ‘

परवानगी नाही अजिबात. आपण आता घरी जाऊ. निर्मलानं तुमच्यासाठी मस्तपैकी जेवण तयार केलं असणार. तुमी आता मस्त जेवण करायचं. खूप दिवसांनी आलायसा. रातभर ऱ्हावा. रातीला मस्तपैकी गप्पा मारू. आराम करायचा अन मंग सकाळी न्याहारी करून निघायचं. त्याबिगर मी सोडणार नाही तुम्हाला. ‘ सोपानराव म्हणाले.

श्यामराव हसले. ‘ तू असा सोडणार थोडाच आहेस बाबा आम्हाला. चला रे बाळांनो, आज सोपानकाकांकडे जेवण अन मुक्काम. ‘ राजेश आणि पिंकीनं आनंदाने टाळ्या वाजवल्या आणि सगळे सोपानरावांच्या घरी गेले.

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वदेशीचा जादू… भाग – ५ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ स्वदेशीचा जादू… भाग – ५ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे  

समृद्ध प्राचीन वारसा – ग्रामीण उद्योग

हेमाडपंती मंदिर पाहिल्यानंतर पिंकी आणि राजेश खुशीत होते. त्यातच खूप दिवसांनी उसाचा रस प्यायल्याने त्यांना आनंद झाला होता. गाडी घनदाट अशा अभयारण्यातून जात असल्याने प्रवासाची मजा काही औरच होती. एका ठिकाणी विश्रांतीसाठी जागा पाहून श्यामरावांनी गाडी थांबवली. ते ठिकाण डोंगरापासून अगदी जवळ होते. झाडांच्या गर्द सावलीत मध्यभागी मोकळी जागा होती. समोरच्या बाजूस असलेल्या भव्य डोंगररांगा लक्ष वेधून घेत होत्या. निरनिराळ्या पक्ष्यांचे आवाज कानावर पडत होते. मधूनच झाडांवर असलेली माकडे इकडून तिकडे मजेत उड्या मारीत होती. आपल्या छोट्या पिल्लाला छातीशी कवटाळून माकडिणी सुद्धा झाडांवर उड्या घेत होत्या. ते सगळे पाहून पिंकी आणि राजेशला खूपच गंमत वाटली. त्यांनी आपल्याजवळील बिस्किटे, घरून आणलेल्या नारळाच्या वड्या त्यांना खाण्यासाठी दिल्या.

मोकळी हवा, गर्द झाडी, प्रदूषणरहित आणि शांत वातावरण मन प्रसन्न करीत होते. श्यामरावांनी आपल्याजवळील कॅमेऱ्याने भोवतालच्या निसर्गाचे सुरेख चित्रीकरण केले. आता सगळ्यांनी झाडांच्या सावलीत असलेल्या मोकळ्या जागी सतरंजी टाकून जेवणाचा आस्वाद घ्यायचे ठरवले. सगळ्यांनाच भूक लागली होती. श्यामलाताईंनी घरून निघताना जेवणाची सगळीच तयारी करून घेतली होती. तांबड्या भोपळ्याच्या दशम्या, पोळ्या, वांग्याचं भरीत, शेंगदाण्याची चटणी, घरीच लावलेले मस्तपैकी दही, जोडीला नारळाच्या वड्या असा फर्मास बेत होता. रोज डायनिंग टेबलवर जेवण घेऊन कंटाळलेल्या मुलांना हे वनभोजन फारच आवडले.

श्यामराव म्हणाले, ‘ पिंकी आणि राजेश, जरा नीट ऐका मी काय म्हणतो ते ! आपण परत जाताना आलो त्याच रस्त्याने जायचं की जवळच एक छानसं खेडं आहे, त्या बाजूने जायचं ? तिथे माझा सोपान म्हणून एक मित्र राहतो. त्यालाही भेटता येईल. जाताना तुम्हाला रस्त्याने शेतं पण बघायला मिळतील. ‘ 

‘अहो बाबा, विचारताय काय ? आम्हाला तर ते खेडेगाव, शेती बघायला आवडेलच. आपण तिकडूनच जाऊ. ‘ पिंकी म्हणाली. राजेशने तर आज मज्जाच मज्जा म्हणून टाळ्या वाजवल्या. सगळे गाडीत जाऊन बसले. श्यामलाताईंनी आपल्या मोबाईलमध्ये जुनी गाणी लावली होती. त्यांना जुनी मराठी गाणी खूप आवडायची. ‘ ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी व्हाऊ दे…’ या गाण्याचा व्हिडीओ त्या पाहत होत्या. पिंकी आणि राजेश कुतूहलानं आई काय पाहतेय हे बघत होते. त्या गाण्यातील लोहाराचा भाता, ऐरण मुलं कौतुकानं बघत होती. गाणं संपलं. पिंकी म्हणाली, ‘ आई, हे गाणं किती छान आहे नाही. आणि गाण्यातली माणसं किती साधी आहेत ! ‘ आई म्हणाली , ‘ पिंकी, अग हे गाणं ज्या चित्रपटात आहे, त्या चित्रपटाचं नावसुद्धा ‘ साधी माणसं असंच आहे. ‘

‘अरे वा, किती छान ! ‘ पिंकी म्हणाली.

‘आई, हे गाणं लता मंगेशकर यांनी गायलं आहे ना ? ‘ राजेश म्हणाला.

‘हो, बरोबर आहे राजेश. पण आणखी एक गंमत आहे बरं का ! ‘

‘कोणती गंमत, आई ? सांग ना . ‘ राजेश म्हणाला.

‘अरे या गाण्याचं संगीत ऐकलंस ना ! किती छान आहे. हे संगीत कोणी दिलं माहिती आहे का ?

‘कोणी तरी प्रसिद्ध संगीतकार असतील त्या काळातले, ‘ पिंकी मध्येच म्हणाली.

‘बाळांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या गाण्याच्या संगीतकार लतादीदीच आहेत. त्यांनी ‘आनंदघन ‘ या नावाने काही चित्रपटांना संगीत दिलं होतं ‘ श्यामलाताई म्हणाल्या.

तेवढ्यात गाडीने एक वळण घेतले आणि दूरवर गावाच्या खुणा दिसायला लागल्या. थोडं अंतर गेल्यानंतर एका मोठ्या कमानीतून गाडी आत शिरली. एका मोठ्या चिंचेच्या झाडाखाली शयमरावांनी गाडी पार्क केली. या गावात श्यामरावांचा बालमित्र सोपान राहत होता. श्यामराव आल्याचं कळताच सोपान मोठ्या आनंदानं त्यांच्या स्वागतासाठी पुढे झाला. दोन्ही मित्रांची खूप दिवसांनी भेट होत होती. दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारली.

श्यामराव म्हणाले, ‘ अरे सोपान, ही माझी मुलं. त्यांना एखादं खेडेगाव बघावं असं वाटत होतं. म्हणून  तुझ्याकडे हक्काने आणले त्यांना. त्यांना जरा गावातून फिरवून आणू या. ‘

‘अरे हो पण आधी आपण घरी जाऊ. तुम्ही सगळे फ्रेश व्हा. मग जाऊ की मुलांना गाव दाखवायला. ‘ सोपान म्हणाला.

सोपानच घर म्हणजे एक जुना वाडा होता. दगडी बांधकाम आणि लाकडाचं छत. घरात स्वच्छता, उजेड भरपूर होता. बाहेरच्या उन्हाचा अजिबात ताप जाणवत नव्हता. निर्मलावहिनींनी सगळ्यांना घर दाखवलं. निर्मलावहिनी सगळ्यांसाठी गूळ घातलेलं कैरीचं पन्हं घेऊन आल्या. सगळ्यांच्या छानपैकी गप्पा झाल्या. श्यामलाताई मुलांना म्हणाल्या, ‘ बाळांनो, सोपानकाकांचं घर नीट पाहिलंत का ? ‘

‘हो आई,’  पिंकी आणि राजेश म्हणाले.

‘बाळांनो, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का ? सोपानकाकांकडे फ्रिज नाही. ‘ श्यामलाताई म्हणाल्या. ‘ ‘ अग आई, खरंच की. ही गोष्ट लक्षातच आली नाही आमच्या. ‘ पिंकी म्हणाली.

बाळांनो, आता आपण कैरीचं पन्हं घेतलं. किती चवदार होतं ते ! थम्स अप, कोका कोला,पेप्सी यासारखी कृत्रिम शीतपेयं पिण्यापेक्षा घरीच बनवलेलं कैरीचं पन्हं, लिंबाचं सरबत, कोकम सरबत, यासारखी पेयं शतपटीनं आरोग्यदायी असतात. कृत्रिम शीतपेयात मोठ्या प्रमाणावर साखर आणि घातक रसायने असतात. शिवाय फ्रिजपेक्षा माठातील पाणी आरोग्याला अतिशय चांगले असते. ‘

‘व्हय व्हय पोरांनो, तुमची आई सांगते ते बरोबर आहे बरं का. आणि एक सांगतो. आमच्याकडे कोणीच चहा घेत नाही. गोठ्यात गाई आहेत. त्यांचे ताजे दूध असते. घरीच बनवलेलं ताक, दही आम्ही वापरतो. शेतातील ताज्या भाज्या, फळे आम्ही खातो. फ्रिजची गरजच नाही. ‘ श्यामराव हसत हसत म्हणाले, ‘ हे आमच्या सोपानरावांच्या उत्तम तब्येतीचं रहस्य आहे म्हणायचं. ‘

‘व्हय की. श्यामभाऊ आम्ही काही मोठा आजार असला तरच शहरात डॉक्टरकडे जातो. नाहीतर आम्हाला साधी गोळी बी म्हाईत नाय. ‘

मग सोपानकाका म्हणाले, ‘ चला रे मुलांनो. आमचं गाव दावतो तुम्हाला. तुमच्या शहरासारखं मोठं नाही बरं का ! बघा, आवडतं का तुम्हाला. ‘

श्यामराव म्हणाले, ‘ सोपान, अरे आम्ही पण येतो की. आपण सगळेच जाऊ. ‘

श्यामलाताई पण तयारच होत्या. सगळेच निघाले. गावात छोटी छोटी घरं होती. काही मातीची, काही सिमेंटची. काही घरे उंच अशा दगडी ओट्यावर होती. मुलांना मजा वाटत होती. गावाच्या एका कोपऱ्यात रामू लोहार राहत होता. एका उंच दगडी ओट्यावर त्याचे घर होते. मुले तिथे पोहोचली तेव्हा रामू कामच करीत होता. एका हाताने तिथे असलेला भाता खालीवर होत होता. त्याच्या हवेने भट्टीतील निखारे लालभडक फुलले होते. त्या भट्टीत त्याने काहीतरी लोखंडाची वस्तू ठेवली होती. ते सगळं पाहून मुलं काही काळ तिथं थबकली.

सोपानकाका म्हणाले, ‘ हे बघायचं का रे बाळांनो. ‘

पिंकी, राजेश दोघेही एकदम हो म्हणाले. शहरात त्यांना असं काही बघायला मिळत नव्हतं. पिंकीला आईने मघाशी लावलेलं गाणं आठवलं. ती म्हणाली, ‘ आई, आपण त्या गाण्यात पाहिलं, अगदी तसंच आहे ना इथे ! ‘

‘अगदी बरोबर आहे पिंकी. आता तू आणि राजेश बघा ते काका कसं काम करताहेत ते ! ‘ आई म्हणाली.

रामुकाकांनी मग भट्टीतील ती वस्तू बाहेर काढली. ती तापून चांगलीच लाल झाली होती. रामुकाकांनी एका मोठ्या सांडशीत पकडून ती ऐरणीवर ठेवली आणि आपल्याजवळ असलेल्या मोठ्या लोखंडी घणाने ते त्यावर घाव घालू लागले. तसतसा त्या वस्तूला आकार यायला लागला. कोणीतरी आज आपल्याकडे आपलं काम बघायला आलं आहे याचा रामुकाकांना कोण आनंद झाला होता. ‘ पोरांनो, वाईच बसा की. समदं नीट बघा. हेच आमच्या रोजीरोटीच साधन, ‘

‘काका, तुम्ही काय बनवताय ? ‘ राजेशनं विचारलं.

‘पोरा, आता शेतीचा हंगाम सुरु व्हईल. मंग वावरात कामासाठी निंदणीसाठी, कंपनीसाठी विळे, खुरपं लागत्यात. त्येच मी बनवतो आहे आता. शेतीसाठी, बैलगाडीसाठी लागणाऱ्या वस्तू बी बनवतो म्या.बैल, घोडे यांच्या पायामंदी नाल ठोकावी लागते. त्ये बी बनवतो. घरात लागणारी विळी, खलबत्ता, अडकित्ता आणि काय काय समदं बनवतो म्यां. पण आता आमचा धंदा लई कमी झालाय. लोकं मोठ्या गावात जाऊन वस्तू घेत्यात. ‘

मग रामूने आपण बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू मुलांना दाखवल्या. मुलं मोठ्या कौतुकानं ते पाहत होती. कारखान्यात बनणाऱ्या वस्तूपेक्षा एखादा कारागीर जेव्हा हाताने वस्तू तयार करतो, तेव्हा त्याला किती मेहनत घ्यावी लागते याची जाणीव मुलांना ते पाहून झाली. राजेश आणि पिंकीच्या मनात खूप सारे प्रश्न होते. श्यामलाताई म्हणाल्या, ‘ बाळांनो, आता सगळं व्यवस्थित बघून घ्या. मग जाताना मी तुम्हाला आणखी छान छान माहिती देणार ! ‘

आपल्या छोट्याशा बागेत काम करण्यासाठी मग श्यामरावांनी त्याच्याकडून एक कुदळ, एक फावडे आणि एक विळा विकत घेतला. रामूलाही खूप छान वाटले.

‘ मुलांनो, झालं का तुमचं समाधान ? आता आपण दुसरीकडे जाऊ. ‘ सोपानकाका म्हणाले.

मग सगळेच सोपानकाकाबरोबर पुढे निघाले. राजेश आणि पिंकीला आता सोपानकाका आणखी काय दाखवतात याची उत्सुकता होती. 

क्रमशः… 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वदेशीचा जादू… भाग – ४ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ स्वदेशीचा जादू… भाग – ४ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे  

समृद्ध प्राचीन वारसा 

श्यामराव, श्यामलाताई , पिंकी आणि राजेश यांची जंगल सफारी मजेत सुरु होती. पिंकी आणि राजेश तर अतिशय खुश होते. बऱ्याच दिवसांनी आई बाबांबरोबर गाडीतून ते सहलीसाठी जात होते. तेथून जवळच एक प्राचीन हेमाडपंती शिवमंदिर होते. ते मुलांना दाखवावे म्हणून श्यामराव त्यांना तिथे घेऊन जात होते. सगळ्यांची वटवृक्षाखाली खाणं आणि थोडी विश्रांती झाली होती. त्यामुळे सगळ्यांचा मूड फ्रेश होता. गाडीत बाबांनी ‘ जय जय शिव शंकर ‘ गाणं लावलं होतं आणि त्या तालावर त्यांचं डोलणं आणि गुणगुणणं सुरु होतं. रस्त्यावर एके ठिकाणी प्राचीन शिवमंदिराकडे असा बोर्ड त्यांना लावलेला आढळला. मुख्य रस्त्याला सोडून गाडी आतमधील छोट्या कच्च्या रस्त्याकडे वळली. थोडेसे अंतर गेल्यानंतर लगेच शिवमंदिर होते. श्यामरावांनी एका लिंबाच्या झाडाच्या दाट सावलीत गाडी पार्क केली. सगळे खाली उतरले.

तिथे एका बाजूला काही माणसे फुले, हार, बेलपत्रे आदी विक्रीसाठी घेऊन बसली होती. शामलाताईंनी एका बाईजवळून बिल्वपत्रे विकत घेतली. दुरूनच शिवमंदिराची दगडी हेमाडपंती बांधणी लक्ष वेधून घेत होती. राजेशच्या मनात नेहमीप्रमाणेच काही प्रश्नांनी गर्दी केली होती. पण बाबा म्हणाले, ‘ बेटा, आपण आधी भोलेनाथांचं दर्शन घेऊ. मंदिरात दर्शन  घेताना काही बोलू नये. मग निवांतपणे तू काहीही विचार. ‘ राजेश म्हणाला, ‘ हो, बाबा.

‘गाभाऱ्याच्या बाहेर एक सुंदर दगडी नंदी होता. सगळ्यांनी आधी त्याला नमस्कार केला. मंदिरात गेल्यानंतर श्यामलाताईंनी आपल्याजवळील बेल काहीतरी मंत्र म्हणत भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण केला. श्यामराव, राजेश, पिंकी यांनीही काही बेलाची पाने पिंडीवर वाहिली.

बाहेरचा दगडी सभामंडप खूपच छान होता. तेथील खांबांवर आणि बाजूच्या कमानीवर छानपैकी नक्षी, पौराणिक चित्रे आणि आकृत्या कोरलेल्या होत्या. आजूबाजूला असलेला उन्हाचा ताप तिथे जाणवत नव्हता. काही क्षण तिथे बसल्यानंतर सगळे बाहेर पडले. आता मंदिराच्या भोवतालचा परिसर ते न्याहाळत होते. राजेश म्हणाला, ‘ बाबा, तुम्ही मघापासून हे मंदिर हेमाडपंथी आहे असं म्हणत होता. हेमाडपंथी म्हणजे काय ? ‘

बाबा म्हणाले, ‘ अरे बाबा, हेमाडपंथी नाही, हेमाडपंती. बरेच लोक हेमाडपंथी असा चुकीचा उच्चार करतात. पण ही मंदिर बांधण्याची पद्धत किंवा शैली हेमाडपंत याने सुरु केली म्हणून हेमाडपंती मंदिर असे म्हटले जाते. अरे तेराव्या शतकात देवगिरीत यादव राजांचे राज्य होते. हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत हा यादवांचा प्रधान होता. तो फार बुद्धिमान होता. त्याने मंदिर बांधण्याची एक नवीन पद्धत विकसित केली. ‘ पिंकी, राजेश, या मंदिराची बांधणी तुम्ही पाहिली का ? ‘ पिंकी म्हणाली, ‘ हो बाबा, नुसते दगडावर दगड ठेवलेले दिसतात. ‘

बाबा म्हणाले अगदी बरोबर, ‘ त्यालाच हेमाडपंती शैली म्हणतात.आजकाल बांधकामासाठी आपण जसा सिमेंटचा वापर करतॊ, तसाच पूर्वी चुन्याचा वापर केला जायचा. पण या अशा मंदिरांमध्ये हेमाडपंत याने असा कोणत्याच पदार्थाचा वापर केला नाही. चौकोनी, त्रिकोणी, पंचकोनी या आकारात दगडी चिरे कापून त्यांच्या खाचा किंवा खुंट्या एकमेकात घट्ट बसतील अशा आकारात कापून या मंदिरांची उभारणी केली आहे. ती इतकी मजबूत झाली आहे की अनेक शतके झाली तरी ही मंदिरे आजही टिकून आहेत. त्याशिवाय कित्येक टन वजन असलेल्या शिळा पंचवीस फुटांपेक्षाही अधिक उंचीवर नेऊन हे बांधकाम करण्यात आले आहे. केवढे विकसित तंत्रज्ञान असेल त्या मंडळींजवळ ! ‘ 

‘कमालच आहे ना बाबा, सिमेंट, चुना न वापरता अशा प्रकारचे बांधकाम करणे म्हणजे आपल्या पूर्वजांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. ‘ राजेश म्हणाला.

‘हो, राजेश, आणि अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत बरं का ! वेरूळचे घृष्णेश्वर मंदिर, औंढा नागनाथ येथील मंदिरे अशीच आहेत. चाळीसगावाजवळील पाटणादेवी येथे असेच शंकराचे हेमाडपंती मंदिर आहे. ‘

पिंकी म्हणाली, ‘ बाबा, किती छान माहिती मिळाली या मंदिराबद्दल ! शाळेत ही माहिती सांगून मी बाईंची शाबासकी मिळवणार. ‘

‘शाब्बास पिंकी. आणि तुम्ही काय करणार राजे ? ‘ बाबा राजेशकडे पाहत म्हणाले.

‘बाबा, आपण या मंदिराचा फोटो घेतला आहे ना ! मी या मंदिराचे चित्र काढून आमच्या चित्रकलेच्या शिक्षकांना दाखवेन. माझे मित्र सुद्धा ते पाहून खुश होतील. ‘ दॅट्स ग्रेट! ‘बाबा म्हणाले.

‘आई, मला तुला काही विचारायचे आहे. मघाशी आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर बेलाची पाने वाहिली. ती का वाहायची आणि तू काहीतरी मंत्र पुटपुटत होतीस तो पण सांग ना, ‘ राजेश म्हणाला.

‘राजेश, पिंकी, अरे बेलपत्र किंवा बेलाची पाने भोलेनाथांना अतिशय प्रिय बरं का ! श्रावणात तर दर सोमवारी भगवान शंकरांना बिल्वपत्रे अर्पण करतात. तुम्ही देव दानवांनी केलेल्या समुद्र मंथनाबद्दल ऐकले असेलच. त्यावेळी समुद्र मंथनातून निघालेले हलाहल शंकरांनी प्राशन करून आपल्या कंठात धारण केले. त्यांच्या सर्वांगाचा भयंकर दाह म्हणजे आग व्हायला लागली. तेव्हा त्यांच्या मस्तकावर बेलाचे पान ठेवण्यात आले. तेव्हापासून शंकराला बेलपत्र वाहण्याची प्रथा आहे. बेलाची तीन पाने सुद्धा अतिशय महत्वाची आहेत बाळांनो. तीन पाने म्हणजे भगवान शंकरांचे त्रिनेत्र, तशीच ही पाने म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजेच महादेव या तिन्ही देवांचे प्रतिनिधित्व करतात.’ 

‘अरे बापरे ! केवढे महत्व आहे बिल्वपत्राचे ! ‘ पिंकी म्हणाली. ‘ आई, तू कोणता मंत्र म्हणत होतीस बेल अर्पण करताना  ? ‘

‘सांगते, ‘ आई म्हणाली. भोलेनाथांना बेलाचे पान अर्पण करताना, ‘त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रं च त्रिधायुतम | त्रीजन्मपापसंहारम बिल्वपत्रं शिवार्पणम ‘ या पौराणिक मंत्राचा जप करतात बरं का पिंकी.  या मंत्राचा अर्थ असा आहे की तीन गुण, तीन डोळे, त्रिशूल धारण करणारे आणि तीन जन्मांचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव, तुम्हाला तीन पाने असलेले बेलाचे पान आम्ही अर्पण करतो. बेलाच्या पानांमध्ये विषनाशक गुणधर्म असतो. शिवाला बेल वाहताना आपल्या हातावरील विषाणू तर नष्ट होतातच पण त्या पानांचा एक प्रकारचा सुगंधही आपल्या हाताला येतो. ‘

‘आणि आणखी एक महत्वाची गोष्ट सांगते तुम्हाला. भगवान शंकरांना हे बेलपत्र इतके प्रिय आहे की आपल्याजवळ दुसरे काही नसेल आणि आपण भक्तिभावाने एखादे बिल्वपत्र जरी त्यांना अर्पण केले, तरी ते संतुष्ट होतात. म्हणूनच त्यांना ‘ आशुतोष ‘ म्हणतात. आशुतोष म्हणजे सहज संतुष्ट होणारा. भगवान शंकर आपल्याला जणू सांगतात की तुम्ही सुद्धा माझ्यासारखे सहज संतुष्ट, समाधानी असणारे व्हा. ‘

‘आई, आशुतोष या नावाचा किती सुंदर अर्थ सांगितलास. माझ्या वर्गात शेखरकाकांचा मुलगा आशुतोष आहे ना. तो माझा चांगला मित्र आहे. पण आता मला या नावाचा अर्थ कळला. ‘ राजेश आनंदाने म्हणाला.

 खरंच आई, आपल्या देवांची नावं, हे बिल्वपत्राचं महत्व, आपल्या वनस्पती आणि एकूणच  सगळ्या गोष्टी, परंपरा किती अर्थपूर्ण आहेत ! पण कोणी अशा त्या समजावून सांगत नाही. ‘

श्यामराव म्हणाले, ‘ अरे, पण बेलाच्या झाडाची माहिती तर तुम्हाला आईने सांगितलीच नाही. तुम्हाला ऐकायची आहे का ? ‘

‘हो बाबा, सांगा. मी आता एका वहीत आपल्या सगळ्या वृक्षांची माहिती लिहून काढणार आणि तिथे त्यांची चित्रे चिकटवून एक छान हस्तलिखित तयार करणार. ‘ राजेश म्हणाला.

‘शाब्बास बेटा ,’ बाबा म्हणाले, ‘ बेल हा एक देशी वृक्ष आहे. बेलाची झाडे आपल्या आशिया खंडात सर्वत्र आढळतात. त्याची पाने, फुले, फळे, खोड असे सगळेच भाग औषधी आहेत. अनेक आयुर्वेदिक औषधात बेलाचा वापर केला जातो. अगदी पोटदुखीपासून ते मधुमेहाच्या आजारापर्यंत या पानांचा उपयोग होतो. बेलाच्या झाडापासून मुरंबा, जॅम, सरबत आदी गोष्टी बनवल्या जातात. बेलाच्या झाडावर पक्षी आपली घरटी बांधतात. कीटक त्याच्या आश्रयाने राहतात. त्याच्या फुलांवर बसलेल्या मधमाशा, फुलपाखरांमुळे परागीभवन होते. बेलाचे लाकूड टणक आणि टिकाऊ असल्याने त्याचा वापर फर्निचरसाठी सुद्धा केला जातो. शेतकरी शेतीची अनेक औजारे तयार करतात. मी तुम्हाला मागच्या वेळी जी वड, पिंपळ यासारख्या वृक्षांची माहिती सांगितली, त्याबरोबरच हे झाडही महत्वाचे आहे बरं, त्याचीही लागवड आपण केली पाहिजे. केवळ धार्मिकच नव्हे तर पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा अशी झाडे खूप महत्वाची असतात. ‘

पिंकी म्हणाली, ‘ बाबा, तुम्ही आणि आईने आज खूप वेगवेगळ्या विषयांची नवीन माहिती दिली आम्हाला. आम्ही आता आमच्या वहीत ही सगळी माहिती लिहून काढू. ‘

समोरच एका ठिकाणी उसाच्या रसाची गाडी होती. सगळेच आता तहानलेले होते. राजेश म्हणाला, ‘ बाबा, उसाचा रस घेऊ या ना. ‘

‘चला, आपण सगळेच रस घेऊ या, ‘ सगळ्यांनी मस्त थंडगार आले, लिंबू घातलेल्या उसाच्या आस्वाद घेतला आणि गाडी मग पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. 

क्रमशः… 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वदेशीचा जादू… भाग – ३ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ स्वदेशीचा जादू… भाग – ३ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे  

वृक्षवल्ली  आम्हा सोयरी वनचरे…

रेडिओवर तुकोबांचा अभंग लागला होता. लताबाई गात होत्या. त्या गाण्याच्या तालावर श्यामरावांनी ठेका धरला होता. तेही गुणगुणू लागले होते, ‘ वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे…’ एवढ्यात राजेशने त्यांची तंद्री भंग केली.. ‘ बाबा, ऐका ना मी काय म्हणतोय ते…? ‘ श्यामराव आपल्या तंद्रीतून बाहेर येत म्हणाले, ‘ हं, बोला राजे. ‘ राजेश म्हणाला, ‘ बाबा, हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना ? ‘ श्यामराव राजेशच्या ज्ञानावर खुश होत म्हणाले, ‘ अगदी बरोबर. बेटा, तुला आवडला का हा अभंग ? लता मंगेशकरांनी फार सुंदर गायला आहे बरं .’ ‘ अहो बाबा, अभंग तर सुदंर आहेच. पण मला विचारायचे ते वेगळेच आहे. ‘ ‘ बोल बोल काय विचारायचे आहे तुला ? ‘ बाबा म्हणाले.. राजेश म्हणाला, ‘ बाबा, आता जसे शाळेत पर्यावरणाचे महत्व शिकवतात. झाडे लावा वगैरे सांगतात. तसे तुकाराम महाराजांच्या काळी पण सांगत असावेत का हो ? ‘ हा प्रश्न ऐकल्याबरोबर बाबांना हसू फुटले. तशी पिंकी मध्ये येत म्हणाली, ‘ बाबा, हा राजेश ना काय विचारेल काही सांगता येत नाही..’

‘ नाही नाही पिंके, अग आपल्या राजेशला पडलेला प्रश्न बरोबरच आहे. या प्रश्नाचे उत्तर मी सांगतो. पण त्याआधी तू एक काम कर. तू आईला आपल्या सगळ्यांसाठी मस्त गरमागरम पोहे करायला सांग. आणि पोहे झाले की तिला पण इकडे ये म्हणावं. ‘

‘ हो बाबा, आता सांगते आईला ‘ असं म्हणत पिंकी स्वयंपाकघराकडे पळाली. ती गेली तशी परतलीही.

राजेश म्हणाला, ‘ आता सांगा ना बाबा माझ्या प्रश्नाचे उत्तर. ‘

‘ हो सांगतो. त्याचं काय आहे राजेश, त्या वेळी आजच्यासारख्या शाळा वगैरे नव्हत्या. गुरुजी किंवा पंतोजी घरी येऊन शिकवायचे. काही ठिकाणी गुरुकुलासारखी पद्धतही होती. पण वृक्षांचे, पर्यावरणाचे महत्व वेगळे सांगावे लागत नव्हते. कारण त्याची जाण त्या काळातील लोकांना म्हणजेच आपल्या पूर्वजांना मुळातच होती. ते स्वतःच पर्यावरणाला जपायचे, त्याची काळजी घ्यायचे. त्याचे संस्कार आपोआपच त्या काळातील लहान मुलांवर व्हायचे. वृक्षांना पवित्र मानून त्यांची पूजा केली जायची. कामापुरतीच विशिष्ट झाडे तोडली जायची. जंगले शाबूत होती, घनदाट होती. त्यावर लोकांची उपजीविका चालायची. आणि तुकाराम महाराजांसारखे संत तर वनातच राहायचे. तिथेच त्यांची उपासना, ध्यान, जपतप इ. गोष्टी व्हायच्या. त्या वनातील वृक्ष, प्राणी हेच त्यांचे सखेसोबती असायचे. त्यांच्या संगतीत त्यांचा वनवासही सुखकर व्हायचा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या साधूसंतांना मुळातच पर्यावरणाची जाण होती, त्याचे महत्व कळले होते. समर्थ रामदासांच्या दासबोधात सुद्धा कितीतरी ठिकाणी वेगवेगळ्या कारणाने वृक्षांचा उल्लेख त्यांनी केला आहे. ‘ बाबांनी सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला.

‘ बरोबर आहे बाबा तुमचं, ‘ पिंकी म्हणाली. आमच्या शाळेतल्या बाईंनी आम्हाला एक पुस्तक वाचायला सांगितलं आहे. अं, काय बरं त्याचं नाव ? हं , आठवलं. ‘ दास डोंगरी राहतो ‘ असं काहीतरी नाव आहे. म्हणजे समर्थ डोंगरातच राहत होते ना.. ?

‘ हो  बरोबर आहे पिंकी,’ आई पोह्याच्या डिश ठेवत म्हणाली. ‘ अगं, गो नी दांडेकरांची आहे ती कादंबरी. आपल्याकडे आहे. मी देईन तुला काढून. ‘

‘ अहो, मी काय म्हणते ? उद्या रविवार आहे. आपण बऱ्याच दिवसात कुठे बाहेर गेलो नाही. आपण मुलांना घेऊन कुठेतरी जाऊ या का ? ‘

पिंकी, राजेश दोघांनी आनंदानं टाळ्या वाजवल्या. ‘ बाबा, जाऊ या ना मस्त कुठेतरी. ‘ पिंकी म्हणाली.

‘ बरं बरं आता तुम्ही सगळे म्हणताय तर जाऊ या. आपल्या गावाजवळ एक अभयारण्य आहे. तिथे शंकराचं एक हेमाडपंती देऊळ पण आहे. तुम्हाला मस्तपैकी झाडं, प्राणी सुद्धा बघायला मिळतील. ‘ श्यामराव म्हणाले. चला, जा आता. तुमचा गृहपाठ पूर्ण करा. मग थोडावेळ बाहेर खेळायला जा. ‘ मुलं आनंदानं तिथून निघून गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळीच श्यामराव, श्यामलाताई, राजेश, पिंकी आणि त्यांची पिंकी जंगल सफारीला निघाले. काही ठिकाणी रस्ता कच्चा होता. त्यामुळे प्रवासाला वेळ लागत होता. आता ऊन झाले होते आणि मुलांना भूक लागली होती. रस्त्यात एक विस्तीर्ण पसरलेले वडाचे झाड श्यामरावांना दिसले. त्यांनी तिथे गाडी थांबवली. सगळे गाडीतून खाली उतरले. श्यामलाताईंनी गाडीतून जेवणाचे डबे काढले. श्यामरावांनी राजेश आणि पिंकीला गाडीतील सतरंजी काढून खाली टाकायला सांगितली. आता सगळेच छानपैकी बसून जेवणाचा आस्वाद घेऊ लागले. राजेश म्हणाले, ‘ बाबा, इथे किती छान, फ्रेश आणि थंड वाटते आहे ! हवा पण छान आहे. ‘

‘ राजेश, हे कोणते झाड आहे माहिती आहे का ? ‘ बाबांनी विचारले. ‘बाबा, मी सांगू ? ‘ पिंकीने विचारले.

‘ हो सांग की ‘

‘ हे वडाचे झाड आहे. बाबा, बघाना याला पारंब्या किती फुटल्या आहेत ! पिंकी म्हणाली.

‘ अगदी बरोबर आहे पिंकी. वडाच्या झाडाला खूप पारंब्या फुटतात. त्या पुन्हा जमिनीत जाऊन वाढतात. हे झाड खूप मोठे वाढते. काही काही वटवृक्ष तर एवढे मोठे असतात की त्यांच्या छायेत एकाच वेळी पाच ते दहा हजार लोक सुद्धा बसू शकतात. प्राचीन काळामध्ये व्यापारी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी या झाडाच्या सावलीत थांबत असत म्हणून या झाडाला इंग्रजीमध्ये बनियन ट्री असेही म्हटले जाते. आणि ही झाडे दीर्घायुषी असतात बरं का राजेश. काही झाडे तर हजार वर्षांपर्यंत जगतात. ‘

‘ बापरे, आश्चर्यच आहे. माणसापेक्षा सुद्धा ही झाडे जास्त जगतात. ‘ राजेश उदगारला.

‘ हो राजेश, वड, पिंपळ यासारखी झाडे खूप वर्षे जगतात. हे अक्षय वृक्ष आहेत. यांना पवित्र मानून त्यांची पूजा केली जाते. ‘

राजेशची आई शाळेत विज्ञान विषय शिकवायची. ती म्हणाली, ‘ राजेश, पिंकी , तुम्हाला माहिती आहे का की वड, पिंपळ, औदुंबर, चिंच, कडुलिंब यासारखी झाडे वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात आणि आपल्याला शुद्ध प्राणवायूचा पुरवठा करतात. पिंपळ वातावरणातील १००% कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतो तर वड आणि कडुलिंब अनुक्रमे ८० आणि ७५ टक्के कॉ डा ऑक्साईड शोषून घेतात. वातावरण शुद्ध करणाऱ्या या निसर्गाच्या गाळण्याच आहेत. ‘

‘ अरे वा, झाडे किती उपयोगी पडतात मानवाच्या !’ राजेश म्हणाला.

‘ अगदी बरोबर आहे राजेश, ‘ बाबा म्हणाले. पण राजेश आणि पिंकी तुम्हाला सांगतो की ही सगळी आपली देशी झाडं बरं का ! पर्यावरण शुद्धीसाठी ही फार मदत करतात. पण गुलमोहर, निलगिरी यासारखी झाडे मात्र या दृष्टीने फारशी उपयोगाची नाहीत. या झाडांची सावली फारशी पडत नाहीत. या झाडांवर पशुपक्षीही घरटे करत नाहीत. पण जे पशुपक्षांना कळते, ते मानवाला मात्र कळत नाही. बाळांनो, तुम्ही थोडावेळ आईशी बोला. तोपर्यंत मी जवळपास आणखी काही बघण्यासारखे आहे का त्याचा तपास करतो. ‘ असं म्हणून श्यामराव तिथून निघाले.

श्यामलाताई म्हणाल्या, ‘ बाळांनो, वड, पिंपळ, कडुलिंब, औदुंबर आणि आपली सगळीच झाडे अतिशय औषधी आहेत बरं का ! ते आपल्याला ऑक्सिजन तर देतातच पण आपले अनेक आजारही बरे करतात. कडुलिंबाच्या काडीने नियमितपणे दात घासल्यास दातांना कीड लागत नाही. पिंपळाची पाने तर किती सुंदर असतात. हृदयाच्या आकाराची ! जेव्हा नवीन पालवी फुटते तेव्हा ते छान गुलाबी, तांबूस असतात. मग हिरवी होतात. त्यांची सळसळ, वाऱ्यावर डोलणं किती मनमोहक असतं. पिंपळाची पाने, साल आणि मुळे औषधी असतात. पोटाच्या आजारांवर त्यांचा उपयोग होतो. पिंपळ पानांचा काढा आपले शरीर डिटॉक्स करतो म्हणजे त्यातील दोष किंवा टॉक्सिन्स काढून टाकतो. पिंपळाची फळे पक्षांचे आवडते खाद्य आहे. या वृक्षाला अश्वत्थ वृक्ष असेही म्हटले जाते. याचा उल्लेख भगवद्गीतेत सुद्धा येतो. गौतम बुद्धानी याच वृक्षाखाली तप केले. त्यांना त्या ठिकाणी दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणून त्या वृक्षाला बोधिवृक्ष असेही म्हटले जाते. बिहारमधील बोधगया येथे हा वृक्ष आहे.

पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या मारुतीचे म्हणजे अश्वत्थ मारुतीचे दर्शन पुण्यप्रद मानले जाते. श्रावण महिन्यात तर दर शनिवारी पिंपळाची पूजा करतात. पिंपळ वृक्षाचे महत्व सांगणारा एक छान श्लोक आहे. तू आता मी तुम्हाला सांगते. तुम्ही लक्षात ठेवा आणि पाठ करा तो.

मूले ब्रह्मा, त्वचा विष्णू , शाखा शंकरमेवच

पत्रे पत्रे सर्वदेवायाम, वृक्ष रादन्यो नमोस्तुते.

म्हणजे ज्या वृक्षाच्या मुळांमध्ये ब्रह्मा, सालीमध्ये विष्णू, फांद्यांमध्ये भगवान शंकर आणि प्रत्येक पानात देवीदेवतांचा निवास असतो, अशा वृक्षराजाला ( पिंपळाला ) नमन असो. ‘

‘अरे वा, आई किती माहिती आहे ग तुला! आज तर आम्हाला खूप नवीन गोष्टी कळल्या. ‘ पिंकी म्हणाली.

राजेश म्हणाला, ‘ आई या वडाच्या झाडाभोवती नुसत्या फेऱ्या मारल्या तरी किती छान वाटते. ‘ श्यामलाताई हसल्या आणि म्हणाल्या, ‘ तुम्हाला माहिती आहे का की वटपौर्णिमेच्या दिवशी आम्ही याच झाडाची पूजा करतो. त्याला प्रदक्षिणा घालतो. ‘ पिंकी म्हणाली, ‘ आई, ते माहितीये, पण का पूजा करतात आणि प्रदक्षिणा का करतात ते सांग ना… ?’

श्यामलाताई म्हणाल्या, ‘ पिंकी तू सावित्री आणि सत्यवान यांची कथा ऐकली असशीलच. तरी मी सांगते. सावित्री ही पतिव्रता होती. यमाने सत्यवानाचे प्राण हरण केले होते. पण सावित्रीने आपल्या सामर्थ्याच्या आणि चातुर्याच्या बळावर यमाकडून त्याचे प्राण परत मागून घेतले. वटवृक्षाखालीच सत्यवानाचे प्राण पुन्हा परत आले. तेव्हापासून सवाष्ण स्त्रिया या वृक्षाची पूजा करतात. आपल्या पतीसाठी दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. त्याला प्रदक्षिणाही करतात. वडाचे झाड भरपूर ऑक्सिजन देणारे आहे. त्यामुळे त्याच्याभोवती प्रदक्षिणा केल्याने आपोआपच शुद्ध प्राणवायूचा आपल्या फुफ्फुसांना होऊन आपले आरोग्य सुधारण्यास मदत होते. शिवाय वडाची मुळे, साल, पाने औषधी असतात. सांधेदुखीवर त्यांचा चांगला उपयोग होतो.

तसेच केस वाढण्यासाठी वडाच्या झाडाचा उपयोग करून तेल बनवतात.

कडुलिंबाचे झाड सुद्धा असेच औषधी असते. त्याची सावली तर खूप थंड असते. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कडुलिंबाच्या कोवळ्या पानांपासून चटणी बनवतो. ती आरोग्यासाठी अतिशय चांगली असते, आपली प्रतिकारशक्ती वाढवणारी असते.

‘अबब ! किती उपयोगी असतात ही झाडे, नाही का ? पिंकी म्हणाली.

‘हो तर. म्हणून बाळांनो, आपल्याला नैसर्गिक आपत्तीपासून आणि ग्लोबल वार्मिंगपासून वाचायचे असेल, आपली वसुंधरा हिरवीगार ठेवायची असेल तर विदेशी झाडांचा मोह सोडून देऊन प्रत्येक १०० मीटर अंतरावर प्रत्येकी एक  औदुंबर, वड, पिंपळ, कडुलिंब यासारखी झाडे लावली पाहिजेत. तसेच प्रत्येक घरासमोर, परसबागेत किंवा आपल्या गच्चीवर तुळस अवश्य लावावी. तुळस अत्यंत औषधी तर आहेच पण पण ती भरपूर ऑक्सिजनचा पुरवठा करणारी वनस्पती आहे. ‘

‘आई, आता कळले की तुकाराम महाराज, ‘ वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ‘ असं का म्हणत असावेत. ‘

एवढ्यात श्यामराव परत आले. ‘ अरे, मायलेकांच्या गप्पा अजून संपल्या नाहीत का ? चला, आपल्याला अजून बरेच काही पाहायचे आहे. ‘

सगळे परत गाडीत बसले. गाडी जंगलाकडे मार्गस्थ झाली.

क्रमशः… 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वदेशीचा जादू… भाग – २ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ स्वदेशीचा जादू… भाग – २ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे  

योग आणि आयुर्वेद

आपल्या देशात आणि आपल्या राज्यात स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या वस्तू, वनस्पती, फळे, फुले या सगळ्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतात. म्हणूनच जाहिरातबाजीच्या मागे लागून विदेशी वस्तू वापरण्यापेक्षा स्वदेशी वस्तू वापरणे कधीही चांगलेच. स्वदेशी चळवळीचे एक महान प्रचारक आणि अभ्यासक राजीव दीक्षित यांनी आपले संपूर्ण आयुष्यच त्यासाठी वाहून घेतले होते. स्वदेशी चळवळीला त्यांनी योग आणि आयुर्वेद यांची जोड दिली होती. घरात विशेषतः स्वयंपाकघरात असणाऱ्या अनेक वस्तूंचा आपल्या आरोग्यप्राप्तीसाठी वापर कसा करून घेता येईल हे त्यांनी अनेक रुग्णांवर प्रयोग करून सप्रमाण सिद्ध केले. घरात असणाऱ्या हळद, दालचिनी, मिरी, लवंग या सारख्या मसाल्याच्या वस्तू तसेच मेथी, खाण्याचा चुना, मीठ यासारख्या अनेक गोष्टींचे अनेक आजारांवर उपयोगी पडणारे गुणधर्म सांगितले. या सगळ्या गोष्टींचा वापर करून आज बाजारात अनेक औषधे आणि सौंदर्यप्रसाधने उपलब्ध आहेत आणि ती आपण घरच्या पदार्थांचा वापर न करता अत्यंत महागड्या किमतीने विकत घेतो.

मीठ, साखर,बेकरी पदार्थ, फ्रिज आणि फ्रिजमधील वस्तू  यासारख्या गोष्टींच्या अतिवापरापासून दूर राहा असेही राजीव दीक्षित यांनी निक्षून सांगितले. तरी घरात मोठा फ्रिज असणे ही आम्ही प्रतिष्ठेची बाब समजतो. रोज मिळणाऱ्या ताज्या भाज्या आणि तयार झालेले अन्न लगेच खाल्ले तर फ्रिजची फारशी गरज राहणार नाही. आजचे आधुनिक संशोधन सुद्धा या सगळ्या गोष्टींचा वापर आरोग्यासाठी चांगला नाही हेच सांगते.

आपला आयुर्वेद आणि योगशास्त्र ही भारतीयांनी जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. पण आपल्या एखाद्या गोष्टीचा जेव्हा परदेशात अभ्यास केला जातो, आणि त्याचे महत्व ते लोक जेव्हा आपल्याला सांगतात, तेव्हा आपल्याला आपल्या प्राचीन गोष्टींचा, परंपरांचा त्या चांगल्या आहेत असा साक्षात्कार होतो. आज भारतातील आयुर्वेद आणि योग यांचे महत्व जगाने मान्य केले आहे. आयुर्वेदाचा उपयोग विदेशात विशेषतः अमेरिकेत एक पर्यायी औषधपद्धती म्हणून केला जात आहे. योग आणि आयुर्वेद ही परस्परपूरक शास्त्रे असून त्या जीवन जगण्याच्या पद्धती आहेत. त्यात मन, शरीर आणि आत्मा यांचे संतुलन साधले जाते.

आयु म्हणजे आयुष्य किंवा जीवन आणि वेद म्हणजे शास्त्र. आयुर्वेद हे जगण्याचे शास्त्र आहे. आयुर्वेद हे शास्त्र अतिप्राचीन असून त्याचा उल्लेख ऋग्वेदात आढळतो. भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे प्रणेते मानले जातात. आयुर्वेदात पुढे चरक, सुश्रुत, वाग्भट आदी महर्षींनी संशोधन करून मानव जातीवर अनंत उपकार करून ठेवले आहेत. याच महर्षींच्या ग्रंथांचा अभ्यास आजही आयुर्वेदाच्या अभ्यासकांना होतो आहे. सुश्रुत यांना तर सर्जरीचे जनक मानले जाते. त्यांच्या ‘ सुश्रुत संहितेत अनेक शस्त्रक्रियांचे वर्णन आले आहे. सृष्टीमध्ये कार्यरत असणारे पृथ्वी, आप, तेज, वायू, जल आणि आकाश या पंचमहाभूतांचा आपल्या आरोग्यावर पडणारा प्रभाव याचा अभ्यास त्यात आहे. त्यानुसार कफ, पित्त, वायू या शरीरातील प्रकृतीचा विचार त्यात आहे.

आयुर्वेद केवळ रोगाच्या लक्षणांचा विचार करून उपचार करीत नाही, तर रोगाचे मूळ कारण शोधून त्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करतो. प्राचीन काळात जे परदेशातील व्यापारी आणि पर्यटन करणारे लोक भारतात आले, त्यांनी आपल्याबरोबर भारतातील हे आयुर्वेदाचे ज्ञान नेले. त्यांच्या बऱ्याच औषधोपचार पद्धतींवर भारतीय आयुर्वेदाचा प्रभाव त्यामुळेच दिसतो. आयुर्वेदाची शास्त्रशुद्ध जपणूक करून प्रसार करण्याचे कार्य केरळ सारख्या राज्यात मोठ्या प्रमाणावर होते. अनेक देशी विदेशी पर्यटक त्याचा लाभ घेतात. महाराष्ट्रातही अनेक नामवंत वैद्यांनी ही आयुर्वेदाची परंपरा जपली आणि वाढवली.

अर्थात वैद्यकीय क्षेत्रात आज अनेक शोध लागताहेत. अनेक आजारांवर संशोधन होते आहे. अलोपथीतील उपचार आणि शस्त्रक्रियांमुळे अनेक रुग्णांना जीवघेण्या आजारातून जीवदान मिळाले आहे. विविध रोगांवर शोधल्या गेलेल्या लशींमुळे लाखो लोकांचे प्राण जगभर वाचले आहेत. त्यामुळे दोन्ही पॅथी आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत. असे असले तरी या दोन्ही उपचार पद्धतींचा मेळ घालून त्यांचा वापर तारतम्याने करणे योग्य होईल. छोट्या मोठ्या आजारांसाठी आयुर्वेदातील उपचारांचा वापर करून अगदी आवश्यक तेव्हा अलोपॅथी उपचार पद्धती वापरता येईल. आयुर्वेद हा सुमारे सहा हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन असल्याचे पुरावे आहेत. त्यातील संशोधकांनी आपले आयुष्य त्यासाठी खर्ची घातले आहे. आयुर्वेदातील उपचारात रोग पूर्णपणे बरा करण्याची क्षमता असून त्या औषधांचे दुष्परिणाम अलोपथी औषधांच्या तुलनेत अतिशय कमी आहेत.

आपल्याला होणाऱ्या आजारातील सुमारे ऐंशी टक्के आजार हे मनोकायिक ( सायकोसोमॅटीक ) असतात असे संशोधन सांगते. म्हणजेच हे आजार संसर्गजन्य नसतात. योग आणि आयुर्वेद शरीर आणि मन या दोहोंचा विचार करून आपल्याला आरोग्यदायी जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात. योग, आसन आणि प्राणायाम यांचे महत्व आज जगाने मान्य केले आहे. 21 जून हा दिवस तर जवळपास संपूर्ण जगात योग दिन म्हणून साजरा केला जातो. योगाचा अभ्यास जगातील अनेक देशात आज केला जातो आहे. आयुर्वेद आणि योग यांच्यात आपल्याला निरामय आरोग्य देण्यापासून ते मोक्षापर्यंत पोहोचवण्याचे अद्भुत सामर्थ्य आहे. योगासने, प्राणायाम, ध्यान आदींच्या साहाय्याने अनेक असाध्य आजारांवर मात करता येते याचा अनुभव आज जगभरातील अनेक लोक घेत आहेत. आजच्या धकाधकीच्या आणि दैनंदिन तणावपूर्ण वातावरणात योग, आसने आणि प्राणायाम अनेक लोकांना आनंदी आणि आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी मदत करत आहेत. रामदेव बाबांसारख्या अनेक योगाचार्यांनी जगभर योगाच्या प्रसारासाठी मोठा हातभार लावला आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा नियमितपणे योगासने आणि प्राणायाम करतात.

रॉबर्ट स्वोबोदा हा अमेरिकेतील ओक्लाहोमा विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेणारा एक तरुण. एकदा काही कारणाने तो आफ्रिकेत गेला. तिथे त्याला अतिसाराची लागण झाली. तेथील एका आदिवासी व्यक्तीने त्याला कसला तरी झाडपाला खायला दिला. त्याचा आजार आश्चर्यकारकरित्या बरा झाला. आपले ओक्लाहोमा विद्यापीठातील वैद्यकीय शिक्षण सोडून आपण शास्त्रशुद्ध असे आयुर्वेदाचे शिक्षण घेतले पाहिजे असे त्याच्या मनाने घेतले. त्यासाठी भारताइतका चांगला देश दुसरा नाही असे त्याला वाटले.  आयुर्वेदाच्या ओढीने तो भारतात आला. पुण्याच्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून आयुर्वेदाची पदवी घेतली. रॉबर्ट स्वोबोदा यांनी मग आयुर्वेदाबरोबरच योगशास्त्र, ज्योतिषशास्त्र, तंत्रविद्या इ. अनेक गोष्टींचा अभ्यास केला. आज ते जगभर आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार करीत आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. ‘ लाईट ऑन लाईफ ‘ हे त्यांचे पुस्तक त्यापैकीच एक.

आरोग्यपूर्ण जीवनासाठी दररोजचा शुद्ध आणि ताजा आहार, योगात सांगितलेल्या अष्टांग मार्गाचे आचरण या गोष्टी आपल्याला निरामय आणि आनंदी जीवनाकडे घेऊन जातात. नियमित योग आणि प्राणायाम करणाऱ्या  आणि संतुलित आहार घेणाऱ्या अनेक व्यक्ती माझ्या पाहण्यात आहेत. त्यांनी  योगाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवले आहे. त्याशिवाय त्यांचा दिवस सुरु होत नाही आणि संपत नाही. वयाला, वृध्दापकाळाला आणि अनेक व्याधींना दूर ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत. आज नव्वदी गाठली तरी पूर्वीच्याच क्षमतेने काम ते करीत आहेत. गाडी चालवताहेत, सभा, समारंभांना जाताहेत. या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी प्रेरणादायी नाहीत काय ? 

क्रमशः… 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अजून ही आशा आहे…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

🌸 विविधा 🌸

☆ “अजूनही आशा आहे…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

(सुमारे पंधरा वर्षांपूर्वी मी लिहिलेले आणि नंतर गायब झालेले लिखाण आज अचानक जुनी कागदपत्रे चाळताना सापडले आणि वाचल्यानंतर हे जाणवले की त्यातील बहुतेक सारी मते आजही मला जशीच्या तशी मान्य आहेत)

लालयेत पंच वर्षाणि  दश वर्षाणि ताडयेत ।

प्राप्तेतु शोडषे वर्षे,  पुत्रं मित्रवदाचरैत ।।

 असे एक संस्कृत वचन आहे.  मुलांचे पाच वर्षे लाड करावेत, दहा वर्षे धाकात ठेवावे आणि सोळाव्या वर्षानंतर मुलांशी मित्राप्रमाणे वागावे असा सरळ अर्थ.

मूल झाल्यावर पहिली पाच वर्षे लाडाची असतात. त्यावेळी मुलं हा आपला आनंद असतो.  लाडाच्या या पाच वर्षात आपण मुलांपासून मिळवलेला आनंद अवर्णनीय असतो व आपल्या आयुष्याला तो अर्थ प्राप्त करून देत असतो.  नंतरची दहा वर्षे मुलांवर संस्कार करायचे असतात.  अशावेळी मुले ही आपली जबाबदारी असते.  त्यांना जबाबदार समाजघटक बनवण्यासाठी सुसंस्कारित करणे व उत्तम नागरिक म्हणून तयार करणे ही पालक म्हणून आपली जबाबदारी असतेच असते. त्यासाठी त्यांना धाक दाखवून का होईना परंतू सुसंस्कारित करणे व पुढील आयुष्यासाठी त्यांचा पाया भक्कम करणे ही जबाबदारी असते.  त्यानंतर मुले पालकांच्या ऐकण्याच्या पलिकडची असतात.  त्यामुळे त्यांच्याशी मित्रत्वाचे म्हणजेच सलोख्याचे संबंध प्रस्थापित केल्याशिवाय कौटुंबिक संबंध सुरळीत रहात नाहीत. जबाबदारीची दहा वर्षे संपल्यावर मुलांना त्यांच्या पायावर उभे राहून पुढील आयुष्याच्या वाटचालीत त्यांचे मित्र, साथीदार,  भागीदार या भूमिकेतून त्यांच्याशी वागून कौटुंबिक संतुलन टिकवणे हे आपल्या स्वतःच्या सुखा समाधानासाठी आवश्यक असते.

 मुलांच्या एकूण जडणघडणीत व पालन पोषणात कुठेही गुंतवणूक हा विचार करणे ही गोष्टच मला चुकीची वाटते.  मुलेही म्हातारपणाची काठी वगैरे जुने विचार आजच्या काळाच्या संदर्भात योग्य आहेत की नाही याचा विचार निश्चितच आवश्यक ठरेल.

पूर्वीच्या पालकांच्या व आत्ताच्या पालकांच्या परिस्थितीत, मनस्थितीत तसेच आजच्या सामाजिक परिस्थितीत खूपच फरक पडलेला आहे.  चिंतायुक्त पालक पूर्वीचेही होते व आजचेही आहेत.  परंतु त्यांच्या चिंतांमध्ये फरक आहे.  पूर्वी फक्त एकच माणूस कमावत असे.  त्याच्या कमाई मध्ये घरखर्च चालवणे ही तारेवरची कसरत असे. आवश्यक गोष्टींसाठी उत्पन्नाची तोंडमिळवणी करताना नाकीनऊ येत असत. त्यामुळे चैनीच्या गोष्टी करणे अशक्यच असे. आजचे पालक त्यामानाने जास्त कमावतात . बहुतांश घरात आई वडील दोघेही कमावते असतात. स्वतःच्या सुखात फारशी तडजोड न करता त्यामध्ये मुलांचेही कोड कौतुक करणे, सर्व कुटुंबाने मिळून काही किमान चैनीच्या गोष्टी करणे सर्वमान्य झाले आहे.

यामध्ये स्वतःच्या सुखाला मुरड घालून फक्त मुलांसाठीच काही करणारे पालक अपवादात्मकच.  त्यामुळे मुलांनी म्हातारपणाची काठी बनावी अशी अपेक्षा ठेवणे हीच चुकीच्या विचारांची गंगोत्री ठरावी.  जे पालक अशा गुंतवणुकीच्या अपेक्षेने मुलांसाठी काही करत असतील तर ही रिस्की गुंतवणूक आहे हे ध्यानात ठेवावे.  मुलांनी जर पुढे विचारले नाही तर ज्याप्रमाणे चुकीच्या पतपेढ्या, बँका वगैरे मधील अधिक व्याजाच्या अपेक्षेने केलेली गुंतवणूक कधीकधी बुडीत होते तशी ही गुंतवणूक सुद्धा बुडीत होण्याची शक्यताही गृहीत धरली पाहिजे. नातेसंबंधातील प्रेमळ सहजीवनाच्या विचारापेक्षा व्यावहारिक विचार जेव्हा प्रबळ होतात त्यावेळी त्यात व्यवहारांमधील रिस्क ही सुद्धा गृहित धरली पाहिजे. 

पुराण काळाचा विचार केल्यास मुले ही म्हातारपणाची काठी वगैरे विचार त्यावेळी नसावेत असे वाटते.  पंचवीस वर्षे गृहस्थाश्रमाची पूर्ण केल्यावर म्हणजे साधारणपणे मुले गृहस्थाश्रमाच्या टप्प्यावर आल्यावर पालकांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याची जी समाजव्यवस्था होती असे ऐकिवात आहे ती चांगलीच.   साधारण २५ ते ३० वर्षा दरम्यान गृहस्थाश्रम व 55 ते 60 वर्षा दरम्यान वानप्रस्थाश्रमात प्रवेश ही खरेतर आदर्श समाजव्यवस्था म्हटली पाहिजे.  आजच्या काळाच्या संदर्भात बोलायचे झाल्यास रिटायरमेंट नंतर पालकांनी वानप्रस्थ स्वीकारणे हे कौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हितावह ठरेल.  वानप्रस्थाश्रम म्हणजे आजच्या संदर्भात विचार करता मुलांच्या संसारात लुडबूड न करता स्वतंत्रपणे राहून समाजोपयोगी कार्यात स्वतःला गुंतवणे.  स्वतःचे अनुभव, जीवनाबद्दलचा दृष्टिकोन यावर आधारित एखादे  समाजोपयोगी कार्य निरपेक्ष बुद्धीने पत्करून समाजाचे ऋण फेडण्यासाठी आयुष्याची पुढील वाटचाल करणे.  आज अनेक समाजोपयोगी संस्था कार्यरत आहेत.  अनेक संस्था उत्तम कार्य करतात.  फार मोठ्या धनलाभाची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या चरितार्थाच्या गरजेपुरते अर्थार्जन करून अशा संस्थांच्या कार्यात झोकून देण्याची आज गरज आहे.  अशा गरजांची पूर्तता या वानप्रस्थाश्रम संकल्पनेतून आजच्या काळात करता येणे शक्य आहे.  मुलांच्या संसारात लुडबूड न करता समाजोपयोगी कार्याचा आदर्श त्यांचे पुढे ठेवला तर त्यांनाही पालकांविषयी निश्चितच आदर वाटेल.

यावर कुणी असे म्हणतील की असले फालतू व्यवहारशून्य आदर्शवाद नकोत. 

प्रॅक्टिकली बोला.

ठीक आहे, प्रॅक्टिकली बोलू.

पहिली पाच वर्षे तुम्ही मुलांसाठी काय करता हो ? खरं म्हणजे तुम्ही मुलांच्या कौतुकात येवढे मग्न असता की, सर्व जगाचे भान विसरता.  जळी स्थळी  मुलांचा विषय व कौतुक याने तुमचे आयुष्य भरून व भारून गेलेले असते.  तो आनंद, ते भारलेपण व कौतुकाची नशा आयुष्यामध्ये येवढे विविध रंग भरते की,  तुमचे आयुष्य हे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असे झालेले असते. म्हणजे या पाच वर्षात तुम्ही मुलांसाठी जेवढे करता त्यापेक्षा किती तरी पटीने अधिक आयुष्यात सुख, आनंद मिळवता.  म्हणजे पहिली पाच वर्षे तुम्ही फायद्यातच असता.  पुढील दहा वर्षांचा विचार करता असे पहा की तुमच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या, तुम्हाला अक्षय सुखाचा झरा देणाऱ्या कुटुंबाच्या सौख्यासाठी ( म्हणजे त्यात तुमचे सुख सुद्धा आहेच )  पडलेली जबाबदारी तुम्ही स्वीकारली, म्हणजे तुम्ही मुलांसाठी काय केलं ?  जे केलं ते स्वतःच्या कर्तव्य पूर्तीसाठी केलं. म्हणजे ही दहा वर्षे ना नफा ना तोटा या परिस्थितीत.  पंधरा वर्षानंतर आपण मुलांचे कौटुंबिक भागीदार म्हणजे पुन्हा बरोबरीतच. आता व्यावहारिक विचार असा की, तुम्ही गृहस्थाश्रमाच्या काळात जी काही संपत्ती मिळवली असेल तेवढाच तुमचा भाग. तो जर तुम्ही मुलांना दिलात तरच फक्त ती गुंतवणूक. यात काहीही वडिलोपार्जित इस्टेटीचा भाग नाही आणि जर तुम्ही वडिलोपार्जित इस्टेट सुद्धा खर्च केली असेल तर तुम्ही मुलांचे कर्जदारच.  अन् स्वकष्टार्जित संपत्ती मुलांना देतानाच जर तुम्ही तुमच्या अपेक्षा त्यांचे समोर मांडून अथवा लेखी एग्रीमेंट करूनच त्यांना दिली तर व्यवहाराचा भाग पूर्ण झाला.  आणि ही एवढीच फक्त तुमची म्हातारपणाची काठी झाली.  परंतु या पद्धतीने तुम्ही काही समाजसेवी संस्थांशीही एग्रीमेंट करू शकता. त्यासाठी ते मुलाशीच केले पाहिजे असेही बंधन कुठाय ?  मुलांशी पटत नसल्यास व तुमचे कडे संपत्ती असल्यास म्हातारपणी जगणे कठीण व अशक्य नाहीच.  त्यासाठी म्हातारपणाची काठी विकत घेण्याची तुमची क्षमता असतेच.  ज्यांची अशी काठी विकत घेण्याची क्षमता नाही त्यांनी पूर्णवेळ समाजकार्यात झोकून देण्याची गरज व आवश्यकता आहेच.  सहसा सध्या प्रत्येकजणच वृद्धापकाळाची सोय म्हणून काही उत्पन्नाची तजवीज करून ठेवत असतोच.  फक्त सर्वात दुर्दैवी असे पालक की जे दुर्धर रोगाने आजारी आहेत, मुले विचारत नाहीत अथवा प्रॅक्टिकली त्यांना ते शक्य होत नाही व जगण्यासाठी पुरेसे उत्पन्न नाही.  या व्यक्ती मात्र खरोखरच दुर्दैवी त्यांचेसाठी सरकारनेच काही सोय करावी.  एक पर्याय असा की त्यांचा वृद्धापकाळाचा खर्च सरकारने उचलावा.  अथवा त्यांचेसाठी इच्छामरणाचा कायदा करावा.  माझ्यामते मुले ही म्हातारपणाची काठी नव्हेतच  आणि ती गुंतवणूक तर अजिबातच नाही व जबाबदारी फक्त मर्यादित कालावधी पुरतीच. पालकत्व हे आव्हान नव्हे तर ती कौटुंबिक सुखांसाठी आपण होऊन स्वीकारलेली जबाबदारी आहे. ही जबाबदारी ज्यांना नको आहे व टाळताही येत नाही त्यांना वाटणारे आव्हान. 

शेवटी आपल्या पिढीने तरी असे काय भव्यदिव्य केलंय की ज्यामुळे पुढच्या पिढीने आपले उपकार मानावेत ?  म्हणूनच या एकविसाव्या शतकातील तरुणांना मी म्हणतो –

एकविसाव्या शतकातील तरुणांनो,

आम्ही तुमचे बाप आहोत,

म्हणूनच,

तुम्हाला मिळालेला जन्मसिद्ध शाप आहोत. आम्हीच दिले तुम्हाला,

भ्रष्ट स्वातंत्र्याचे वरदान ?

सामाजिक अराजकतेचे दान ?

ढासळत्या पर्यावरणाचे थैमान.

आम्हीही होतो तरुण एकेकाळी,

पण नाही थोपवू शकलो हा प्रवाह,

नाही परतवू शकलो या लाटा,

पराभूत अन्  प्रवाहपतिताचं जिणं, 

जरी जगलो तरी……….

नाही गेलो भोव-याच्या तळाशी. 

प्रवाहातील पत्थरांना चुकवत,

कपाळमोक्ष नाही होऊ दिला.

म्हणूनच अजूनही अशा आहे,

प्रवाह वळवता येईल,

बिघडलेलं सावंरता येईल,

सुकृताच्या अनुभूतीवर

विकृताचा आकृतिबंध सुधारता येईल.

खरंच येईल तरुणांनो,

आम्हाला आशा आहे.

आमच्या शापित जीवनाला,

शिव्या घालत बसण्यापेक्षा,

आमच्या सुकृताच्या अनुभूतीचं सार जाणून घ्या. विचार करा, कृती करा.

या कृतीत आमचं जीवन संपून जाणं

अनिवार्य असेल तरी कचरू नका,

पण प्रवाहपतित होऊ नका.

इतिहासाची पुनरावृत्ती करू नका.

भविष्यकाळाच्या भल्यासाठी,

भूतकाळाच्या छातीत खंजीर खुपसणं,

आवश्यकच असेल तर ………..

हे नव्या पिढीतील ब्रुटसांनो, 

हा वृद्ध सीझर, निशस्त्र होऊन,

तुमचा वार झेलण्यास सिद्ध आहे,

अन गर्जना करतोय,

देन सीझर मस्ट डाय.

देन सीझर मस्ट डाय.

©  श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ – पाऊस…– ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

?  विविधा ?

☆ – पाऊस…– ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

पाऊस सगळीकडे सारखाच पडतो.. बालपणात कोसळणाऱ्या पाऊस धारा कागदी होडी करून अंगणातल्या पाण्यात सोडणारा हा पाऊस, कसलीच कोणतीच तमा न बाळगणारा चिंब भिजून आनंदाने उड्या मारणारा हा पाऊस.. नकळत आपलं बालपण डोळ्यासमोर आणतो.. . आपलं लेकरू पावसात भिजून आजारी पडेल म्हणून काळजी करणाऱ्या आई कडे दुर्लक्ष करून हे बालिश बालपण ये आई मला पावसात जाऊदे! एकदाच ग  भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे .. म्हणत पावसाचा आनंद घेत उड्या मारत राहतं.. पावसात चिंब भिजून कुडकुडत आईच्या पदराची  ऊब मिळताच मात्र समाधानाने आईच्या कुशीत शिरतो तो अल्लड बालिश पाऊस.. . आईचा लाडिक ओरडा आणि सोबत मायेने भरलेला उन उन दुधाचा पेला पिवून दुसऱ्या दिवशी पुन्हा पावसात भिजण्याची स्वप्न बघत मायेच्या कुशीत शिरणारा बालिश पाऊस वेगळ्याच दुनियेची सफर घडवतो.. . कॉलेज च्या खिडकीतून कोसळणाऱ्या पाऊस धारा पाहून नुकतीच तारुण्यात प्रवेश केलेली तरुण पोरं पोरी प्यार हुवा इकरार हुआ म्हणत एकच छत्रीत आपल्या प्रियकर/ प्रेयसी सोबत नव जीवनाची स्वप्न पाहणारा हा पाऊस रोमँटिक होऊन जातो.. गुलाबी प्रेमाची बरसात करणाऱ्या ह्या पावसाच्या सरी मोगऱ्याचा गंध घेऊन येतात.. नुकतीच लग्न बंधनात बांधली गेलेली जोडपी त्यांच्यासाठी हा पाऊस वेगळचं गोड स्वप्न घेऊन येतो.. खिडकीतून बरसणाऱ्या जलधारा पाहताना आपल्या सख्याची वाट बघणारा स्वप्नाळू पाऊस, दमून भागून आलेला आपल्या सख्याची एक प्रेम भरली नजर पडताच ह्या प्रेम सरीत चिंब भिजून जाते.. पाऊस किती स्वप्न, किती नव्या आशा घेऊन येतो.. हाच पाऊस म्हातारपणात मात्र जून्या आठवणींना उजाळा देत कानटोपी आणि शाल शोधत बसतो.. पावसाची चाहूल लागताच छत्री, रेनकोट यांची तजवीज करू पाहणारा पाऊस आपलं वय वाढलंय ह्याची जाणीव करून देतो.. शेतकरी राजासाठी तर पाऊस म्हणजे निसर्गाचं वरदान च जणू.. पावसाच्या प्रतिक्षेत काळ्या मातीची मशागत करू लागतो.. पावसाची पहिली सर कोसळताच पेरणीसाठी लगबग करवणारा हा पाऊस.. नवीन आशा, नवीन स्वप्नं घेऊन येतो.. कधी ह्याचं रौद्र रूप अनेकांना रडवतं, अनेक संसार उध्वस्त करतं, कधी  किती तरी सप्नांची राखरांगोळी होते.. मृत्यूचा खेळ असा काही रंगतो की अश्रुंच्या सरी वर सरी बरसु लागतात.. पाऊस काय किंवा नैसर्गिक कोणतीही आपत्ती काय? ह्या सगळ्या आपत्तीसाठी कुठे तरी आपण मनुष्य च कारणीभूत आहे हे मात्र सोयीस्कररीत्या विसरतो.. पावसाळा आला की अनेक पर्यावरणप्रेमी मंडळी वृक्षारोपणाचे अनेक कार्यक्रम घेतात.. एकदा झाडं लावून फोटो काढले आणि स्टेटस ठेवलं की मग वर्षभर मोकळे.. अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद हा असतोच.. बाकी काहीही असलं तरी पाऊस आणि माणसाचं नातं मात्र अबाधित राहत.. काही वेळा कडू आठवणींसोबत तर बऱ्याच वेळा गोड, गुलाबी आठवणींची बरसात करणारा हा पाऊस आयुष्य जगण्यासाठी नवी प्रेरणा घेऊन येतो हे मात्र नक्की..

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ म्हण बदलायची वेळ आली ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

🌸 विविधा 🌸 

😅 म्हण बदलायची वेळ आली ? 🌧️🤣 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“गर्जेल तो पडेल काय ?” ही दरवर्षी पावसाळ्यात कानावर पडणारी म्हण, यावर्षीपासून इतिहास जमा होणार की काय, अशी मला पावसात न भिजताच ओली भीती वाटायला लागली आहे मंडळी ! असं वाटायच कारण म्हणजे यंदा पाऊस आला पण नेहमीसारखं त्याचं आगमन सुरवातीला विशेष जाणवलं नाही. नंतर नंतर त्यानं अनेक राज्यात हैदोस घातला ही बाब आलाहिदा, पण यंदा त्याच आगमन जणू निसर्गाने ढगाला सायलेंसर लावला आहे अशा स्वरूपातच होतंय, हे आपण पावसात न भिजताच मान्य कराल याची मला कांदा भजी खाता खाता खात्री आहे !  या मागची वैज्ञानिक कारण काय आहेत यावर हवामान खाते विजेसारखा प्रकाश टाकेल न टाकेल, पण आपल्या सारख्या सुज्ञ लोकांच्या, पावसात ओल्या झालेल्या सुपीक डोक्यातून याच काय उत्तर असेल ते आपण म्या पामराला लवकरात लवकर कळवले तर बरं होईल. नाहीतर काय होईल, आत्ता कांदा भजी खायला कितीही कुरकुरीत लागत असली तरी एखाद्याच्या ओल्या डोक्यातून आलेलं एखादं या मागच भन्नाट कारण माझ्या जिभेची चव बीघडवायला पुरेसं आहे, होय की नाही ? आणि ती व्यक्ती माझ्यासारखा कांद्या भज्या बरोबर गरमा गरम आल्याचा चहा न घेता इतर काही “अमृततुल्य पेय” पीत असेल तर मग माझं रक्षण धो धो पडणाऱ्या पावसात वरचा छत्रीधारी सुद्धा करू शकणार नाही, याची मला बालंबाल खात्री आहे !

हे ढगांच असं मूकं राहणं, विजांच न कडकडणं मला अजिबातच आवडलेलं नाही मंडळी.  त्यामुळे होत काय, खरखुरा पावसाळा यंदा आला आहे असं वाटतच नाही माझ्या सारख्या सामान्य माणसाला. मग पावसाळी पिकनिक ठरवायचा मूडच जातो माझा !

मंडळी मी जेंव्हा माझ्या नसलेल्या डोक्याला थोडा ताण दिला तेंव्हा याच एक उत्तर माझ्या डोक्यात चमकून गेलं, बघा तुम्हांला पटतंय का !  सध्या सर्वपक्षीय नेत्यांचा, या नां त्या कारणाने जो घोषणारुपी गडगडाट चालला आहे त्याला घाबरून मेघांचा घसा तर बसला नसेल ना? हे माझं कारण मलाच पटलं आणि मी डोक्यावर पांघरूण घेऊन झोपी गेलो !

जाता जाता सुज्ञ वाचकांना एक इशारा – कुठल्याही निसर्ग कोपाला लागू असलेलं “हा ग्लोबलवार्मिंगचा परिणाम आहे” हे घासून गुळगुळीत झालेलं उत्तर देवून माझ्या डोक्याची आणखी शकलं करू नयेत ! कारण हा निसर्ग कोप नक्कीच नाही !

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वप्न… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

स्वप्न? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

स्वप्न नुसता शब्द जरी वाचला तरी कितीतरी विचार मनात रुंजी घालायला लागतात. कारण प्रत्येकाचे काही ना काही स्वप्न असतेच आणि ते कोणी बोलून दाखवले नाही तरी ते पूर्ण करण्यासाठी त्याची धडपड सुरू असते.

स्वप्नांची सुरुवात जन्मल्यापासूनच होते. लहानपणी पाळण्यात बाळ झोपलेले असताना झोपेत बाळ गोड हसते किंवा झोपेतच दचकून एकदम रडायला लागते तेव्हा आजी किंवा घरातील मोठ्या व्यक्ती म्हणतात स्वप्न पाहिलं असेल. सटवाई बाळांना स्वप्न दाखवते.

नंतर मुल जसजसे मोठमोठे होऊ लागते तसतशी त्याची स्वप्ने पण बदलत जातात. आणि शक्यतो बदललेली स्वप्ने ही त्या त्या काळानुरूप त्याला योग्य वाटतील अशी असतात आणि लहान वयातील स्वप्ने बहुतांशी पूर्ण झालेली असतात म्हणून मग त्या आत्मविश्वासाने मोठी स्वप्ने पाहिली जातात.

अब्दुलजी कलाम यांनी म्हटलय छोटी स्वप्ने पाहणे हा अपराध आहे. स्वप्ने मोठी पहा त्याचा पाठपुरावा करा आपोआप ती पूर्ण होतील.

या बाबत ते असेही म्हणतात की स्वप्ने अशी नसावीत की जी झोपेत पाहिली जातात स्वप्ने अशी असावीत की जी झोपूच देत नाहीत.

साधारणपणे मुली ज्या असतात त्या बहुतांशी आपल्या सुखी संसाराचे असे एकच स्वप्न पहातात. त्यासाठी त्या झटत असतात. आणि अगदी १००% नाही तरी काही अंशी त्या त्यामधे यशस्वी होतात. पण मुलांची स्वप्ने मात्र वेगवेगळी असतात.

पण नेमके स्वप्न म्हणजे काय? तर स्वप्न म्हणजे ध्येय म्हणता येईल. जे गाठण्यासाठी ज्याची त्याची धडपड चालू असते. हीच गोष्ट त्याच्या जगण्याचे कारण बनते .लहानपणी आई वडिल किंवा मोठे सांगतात ते पूर्ण करणे आपली जबाबदारी आहे वाटून पाहिलेले स्वप्न नंतर महत्व पटल्यावर चांगला अभ्यास करण्याचे स्वप्न नंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगल्या नोकरीचे स्वप्न नंतर आपले संसार करण्याचे स्वप्न आणि मग संसारतील व्यक्तींना सुख देण्याचे स्वप्न या स्वप्नचक्रात माणूस अडकलेला असतो.

काहीजण कला जोपासण्याचे त्यात नाव कमावण्याचे स्वप्न पाहतात . किंवा काही जण वेगळे काही करून दाखवण्याच्या ईर्षेने पेटलेले दिसतात.

पण म्हणून सगळ्यांनाच महत्व प्राप्त होत नाही. स्वप्ने जी इतरांपेक्षा वेगळी असतात त्यात इतरांचेही हित सामावलेले असते जे सोपे नसते हे सगळ्यांना माहित असते पण असे स्वप्न जेव्हा कोणी पाहतो आणि ते पूर्ण करतो तेव्हा त्याचे नाव झालेले आपण पाहतो.

तर अशी ही स्वप्ने. पण यातूनही स्वप्नाचा खरा अर्थ समजत नाहीच. आपल्याला आश्चर्य वाटेल  पण स्वप्नाचा आणि अध्यात्माचा जवळचा संबंध आहे.

कसा? अध्यात्म सांगते मी पणा सोडा. सगळे चांगले होईल. तसेच हे स्वप्न••• स्व पणा नसलेल••• पहा एखादे स्वप्न पूर्ण करणारा स्वत:ची तहान भूक विसरून किंवा बाकीचे जग विसरून अर्जूनाच्या लक्ष्याप्रमाणे फक्त स्वप्नाच्या पाठीमागे असतात. यामधे कुठेही स्व पणा अर्थात मी पण पर्यायाने अहं नसतो म्हणून ते स्वप्न.

सगळ्यांची स्वप्ने ही मी पणाशी निगडीत असतात म्हणून त्याला महत्व प्राप्त होत नाही. पण मोठी स्वप्ने ज्यामधे इतरांचेही हित सामावलेले असते अशी स्वप्ने पाहणारी माणसे वेगळीच असतात त्यामुळे अशी स्वप्ने पाहणार्‍याचे नाव होते आणि त्याचे अप्रुप वाटू लागते.

म्हणूनच चला मी पणा सोडून देऊ. सर्व सामावेशतकतेचे स्वप्न पाहू आणि घर शहर देश नव्हे सर्व जग सुखी करण्याचे स्वप्न पाहू

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares