मराठी साहित्य – विविधा ☆ सोशल मीडिया पासून सावधान… भाग – ३ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ सोशल मीडिया पासून सावधान… भाग – ३ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

मागच्या आठवड्यात मला एक फोन आला.लाईट बिल भरले नाही.एम.एस. ई.बी.मधून बोलतो आहे असे सांगणारा.त्यांना बिल भरल्याचे सांगितले.त्यावर पलीकडून पत्ता,बिलाची रक्कम,कसे भरले आहे याचे डिटेल्स सांगण्यात आले.पण त्या ॲप मधून भरल्यामुळे बिल मिळाले नाही असे सांगितले.बिल आज भरले नाही तर वीज कट होईल सांगितले.मी ऑफीसमध्ये जाऊन बघते असे सांगितले.तर म्हणे आम्ही बिल अपडेट करून देतो.फक्त एक ॲप डाऊनलोड करा.आणि त्या वर येणारा ओ टी पी सांगा.बाकीचे आम्ही बघतो असे सांगितले. ओ टी पी पाठवा म्हंटल्यावर मी सावध झाले.डोक्यात धोक्याची घंटा वाजली.मी सांगितले माझे सगळे कॉल आपोआप रेकॉर्ड होतात.हा कॉल पोलिसांना ऐकवते आणि मग ठरवते.हे ऐकल्या बरोबर पलीकडून कॉल कट झाला.आणि मी बँक रिकामी होण्यापासून वाचले.नंतर असे बरेच किस्से समजले.म्हणून हे लिहावे वाटले.

सध्या नेट वरून फसवणुकीचे असे प्रकार खूप वाढले आहेत.आपल्याला घाबरवून अशी माहिती मागवतात आणि त्या आधारे पैसे लुबाडतात.

हे एक प्रकारचे सायबर फिशिंग असते.जसे मासेमारी साठी गळ टाकतात तसेच होते.यात एखादे ॲप किंवा लिंक गळ म्हणून वापरले जाते.ते ॲप डाऊनलोड केले.किंवा लिंक क्लिक केली की आपण त्यात अडकतो.आणि आपली सगळी माहिती गुन्हेगारांना मिळते.

कोणतीही सुविधा आली की त्याचे फायदे तोटे दोन्ही असते.कोणत्याही सुविधा किंवा आधुनिक तंत्रज्ञान वाईट नसते.गरज असते ती आपण पूर्ण माहिती घेऊन ते काळजी पूर्वक वापरण्याची.जसे सिगारेट पाकिटावर वैधानिक इशारा असतो.तसेच इशारे याच सोशल मीडिया वर वारंवार दिले जातात.पण आपण सोयीस्कर दुर्लक्ष करतो.आणि अशा सापळ्यात अडकतो.तरी सावध राहून व्यवहार करावेत.ते आपल्या सोयी साठीच असतात.

अजून एक सांगावेसे वाटते.आपण ज्या देवदेवतांच्या इमेज किंवा संदेश असलेल्या इमेज पाठवतो त्या मुद्दाम फोन मध्ये व्हायरस सोडण्यासाठी बनवलेल्या असतात.अगदी सगळ्याच तशा नसतात.पण आपण काळजी घ्यावी.आपल्याला सुद्धा चांगले विचार सुचतात की,ते टाईप करून पाठवावेत.आणि आलेल्या इमेज डाऊनलोड न करता डिलीट कराव्यात.

आपली थोडी सावधगिरी

नेट घेई भरारी…

अवघड कामे सहज करी

आपली वाचवे फेरी…

मीडिया धरू करी

वेळ श्रम वाचवू परोपरी

तंत्रज्ञानाची कास धरी

परी बाळगू सावधगिरी

© सुश्री विभावरी कुलकर्णी

१०/६/२०२३

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्यास पौर्णिमा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? विविधा ?

व्यास पौर्णिमा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

(नुकत्याच  झालेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त)

महर्षी व्यासांचा जन्म आषाढ शुद्ध पौर्णिमेला झाला म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा किंवा गुरु पौर्णिमा असे म्हणतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहे

      नाना कथा रुपे भारती

      प्रकटली असे त्रिजगती

      आविष्करौनी महामती

      व्यासाचिये

म्हणूनच आपण सगळे रोज त्यांना प्रातःवंदना देताना म्हणतो

      अश्वत्थामा बलिर्व्यासो

      हनुमानश्च बिभीषण:

      कृप: परशुरामश्च

      सप्तैते चिरंजीविन:

      सप्तैतान् स्मरेनित्यम्

      सर्वव्याधिविवर्जितम्

या सात चिरंजीवांचे स्मरण जो करेल तो निरोगी असेल. आचार्य किशोरजी व्यास म्हणतात “महर्षी व्यास हे जगातील साहित्यिकांचे मेरुमणी आहेत”. त्यांनी भरपूर ग्रंथसंपदा निर्माण केली. त्यांचे मूळ नाव द्वैपायन .वेदांचा विस्तार केला म्हणून त्यांना वेद व्यास असे म्हणतात. पूर्वी एकच वेद होता. पण तो मोठा असल्यामुळे लोक वाचू शकत नव्हते. त्यातील ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावे या तळमळीने व्यासांनी त्याचे चार भाग केले. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, आणि सामवेद. एके दिवशी नैमिषारण्यात निमंत्रितांसाठी धर्मसभा भरली. धौम्य ऋषी म्हणाले, वेदांचा अमूल्य ज्ञाननिधी आता सुरक्षित झाला. द्वैपायनाच्या या कार्याचा आम्ही कृतज्ञतापूर्वक गौरव करतो. आणि आजपासून त्याला या युगाचा व्यास निर्धारित करतो. त्याचप्रमाणे ज्या पीठावरून त्याने सर्वांच्या शंकांचं समाधान केलं ते पीठ यापुढे “व्यासपीठ” म्हणून संबोधित करण्यात येईल. यापुढे महत्त्वाच्या सभांमध्ये देखील ज्ञानी वक्त्यांसाठी किंवा पारंपारिक विषयांच्या सभांमध्ये निर्माण केलेल्या पीठालाही व्यासपीठ हीच अधिकृत संज्ञा असेल. सामान्य विषयांच्या चर्चेसाठी उपयोगात आणले जाणारे पीठ मंच असतील. (उदाहरणार्थ, राजकीय मंच, काव्य मंच वगैरे ).आणि अभिनयासाठी असलेले ते रंगमंच. अशा भिन्नपीठांसाठी विविध संज्ञांचा प्रयोग करावा. ब्रम्हर्षी वशिष्ठ हे व्यासांचे पणजोबा. त्यांनी आपल्या पणतवाला हृदयाशी कवटाळले. आनंदाश्रूंचा अभिषेक केला.  त्यांच्या खांद्यावर व्यासपदाचा सन्मान असलेलं वस्त्र पांघरले.  द्वैपायन आता व्यास झाले. हा अनुपम सोहळा अनुभवताना सारे सभागृह आनंदाश्रूंनी न्हाऊन निघाले. ते मूळ व्यासपीठ म्हणजेच व्यास गद्दी नैमिषारण्यात अजूनही सुस्थितीत आहे.

पण वेदातील तत्त्वज्ञान सुद्धा लोकांना समजेना. अशा लोकांसाठी त्यांनी पुराणे लिहिली. सर्वांना कथा आवडतात .पुराणांमध्ये विश्वातल्या प्रत्येक विषयावर त्यांनी लिहिलं. त्यांनी अठरा पुराणे रचली. उपनिषदे लिहिली.

     परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम्

     अष्टादश पुराणानि व्यासस्य वचन द्वयं

त्यानंतर त्यांनी महाभारत रचले. त्यावेळी त्यांनी 18 पर्व आणि 18 अध्याय यांचा प्रयोग केला होता. महाभारताचे युद्ध 18 दिवस चालले. या युद्धाच्या वेळी 18 औक्षहिणी सैन्य होते .दोन्ही बाजूंनी फक्त अठरा महारथी होते. जेव्हा महाभारत युद्ध संपले त्यावेळी सर्व लोक मारले गेले .फक्त 18 लोक शिल्लक होते. गीतेचे अध्याय देखील अठराच आहेत. महाभारताला पाचवा वेद असेही म्हणतात.

आपला अंध पुत्र धृतराष्ट्र याला महाभारत युद्ध पाहता यावे म्हणून संजयला दिव्यदृष्टी देऊन महर्षी व्यासांनी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद ऐकवला. तीच भगवद्गीता. विश्व साहित्यात तिचे निर्विवाद उच्च स्थान आहे. गीतेचा पाठ करण्यापूर्वी खालील श्लोक म्हणतात

     ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता

      नारायणेन स्वयम्,|

      व्यासेन प्रथितां पुराणमुनिना

      मध्ये महाभारतम् ||

      अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम्

      अष्टादशाध्यायिनीम्ब|

      त्वामनुसंदधामी भगवद्गीते

      भगवद्वेषिणीम्||

याचा अर्थ:- भगवान नारायणांनी स्वतः पार्थाला म्हणजे अर्जुनाला सांगितली होती आणि जी महाभारतात प्राचीन ऋषी व्यासांनी रचली होती, हे देवी माते, पुनर्जन्माचा नाश करणारी ,अद्वैताच्या अमृताचा वर्षाव करणारी आणि अठरा प्रवचनांनी युक्त अशा या गीतामाते,मी तुझ्यावर ध्यान करतो. आणि त्यानंतर महर्षी व्यासांना नमस्कार करण्यासाठी खालील श्लोक म्हणायचा असतो.

      नमोस्तुते व्यास विशालबुद्धे

      फुल्लारवींदयातपत्रनेत्र

      येन त्वया भारतातैलपूर्ण:

       प्रज्वलितो जनमय: प्रदीप:

याचा अर्थ :- हे व्यास, व्यापक बुद्धीच्या आणि फुललेल्या कमळाच्या पाकळ्यांसारख्या डोळ्यांनी ज्यांच्या हातून महाभारताच्या तेलाने भरलेला ज्ञानाचा दिवा प्रज्वलित झाला आहे अशा तुला नमस्कार असो.

“व्यासो$च्छिस्टं जगत्सर्वम्” असे म्हणतात.  व्यासांना सर्व विषयांचे ज्ञान होते. संपूर्ण जगात एकही गोष्ट अशी नाही की जिला व्यासांनी स्पर्श केलेला नाही. ते अलौकिक मानसशास्त्रज्ञ होते.

अखेर ते थकले. त्यांना मुक्त व्हावे असे वाटू लागले. ते गंगेच्या तिरावर आले. त्यांचे गुरु देवर्षी नारद मुनी त्यांना भेटायला आले. ते म्हणाले ,”मी भगवंताचा निरोप सांगण्यासाठी आलो आहे. तुमची स्थिती भगवंतांनी ओळखली. आता त्यांचा निरोप आहे. जोपर्यंत भगवंत आज्ञा देत नाहीत तोपर्यंत आपण पृथ्वीवरच राहावं.” महर्षी व्यास मनापासून हसले. ते म्हणाले, भगवंतांची आज्ञा शिरसावंद्य. मी इथेच राहीन. माझं एकच ध्येय आहे, लोककल्याण आणि भगवंतांचं सतत नामस्मरण.

        अचतुर्वदनो ब्रह्मा,द्विबाहूरपरो हरि:,

       अभाललोचन: शंभुर्भगवान् बादरायण:

त्यांना चार मुखे नाहीत पण ते ब्रह्मा आहेत. दोन बाहू असले तरी हरी आहेत. कपाळावर तिसरा डोळा नाही पण शंकर आहेत. असे हे बादरायण आहेत. अशा या वंदनीय महर्षी व्यासमुनी यांना कोटी कोटी नमन.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सोशल मीडिया पासून सावधान… भाग – २ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ सोशल मीडिया पासून सावधान… भाग – २ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सोशल मीडिया विषयी बोलताना आपण फक्त जास्त प्रमाणात जास्त प्रमाणात वापरले जाणारे दुसरे माध्यम म्हणजे फेसबुक या विषयी बघू.

आज पहाटे मला एक रिल मुलाने पाठवले.हा एक लोकप्रिय होत असलेला नवीन प्रकार काही सेकंदात आपले म्हणणे दुसऱ्यांच्या गळी उतरवणे कधी विनोद,कधी सावध करणे हे याचे काम.तर या रिल मध्ये एक नवीन फसवणुकीचा प्रकार सांगितला आहे.आपल्याला फेसबुक वर Look who died in an accident असा मेसेज येतो.त्यात एक लिंक येते.त्यावर क्लिक केले की आपले log in चे डिटेल्स विचारतात.ते दिले की आपण out आणि विचारणारा in होतो.आणि आपल्यालाच मोठा अपघात होतो.आपले बँक खाते रिकामे होते.थोडा तपास केला असता दुर्दैवाने यात फसलेले लोक सापडले.

अजून एक उदाहरण मी बघितले.एकीने घरातील लग्न सोहळ्याचे सतत रोज होणारे कार्यक्रम फेसबुक वर टाकले.अगदी फोटो सहित.येणारे लाइक्स बघून खुश झाली.घरी बसल्या बसल्या सर्वांना सगळे कार्यक्रम फोटो,व्हिडिओ याच्या माध्यमातून दाखवू शकली.आणि या वयात मी किती जगा बरोबर आहे ( हम भी कुछ कम नही ) हे ऐटीत दाखवू शकली.मग त्यात सगळेच फोटो,विधी अगदी कव्हर केले.लग्न छान झाले.लग्नात एक आकर्षक पाकीट आले.त्यात हरखून सोडणारे गिफ्ट सगळ्या फॅमिली साठी चार दिवसाची ट्रीप मिळाली अगदी तिकिटे सुद्धा मिळाली. मंडळी खूप आनंदली.लगबगीने तयारी करून निघाली.आणि या मॅडमचे फेसबुक वर अपडेट सुरू झाले.प्रवासाचे फोटो येऊ लागले.सगळे डिटेल्स आम्हाला कळू लागले.मोठ्या आनंदात घरी आले.बघतात तर घर पूर्ण रिकामे.आंघोळीची बादली सुद्धा घरात राहिली नव्हती.हे घरातील फेसबुक वर केलेले प्रसारण किती महागात पडले?

अशा फसवणूका पण मोठ्या प्रमाणावर चालू आहेत.यात चोरांना आपणच माहिती पुरवतो.ते फक्त त्यांची थोडी हुशारी वापरतात आणि आपल्याला अद्दल घडवतात.

एक घटना तर मन बधीर करणारी समजली.एका घरात राहणारी चार माणसे.घरातील वयस्कर आजोबा वारले.मुलाने ही बातमी सगळी कडे टाकली अर्थातच सोशल मीडिया वर. सांत्वन करण्यासाठी भरभरून संदेश आले.पण प्रत्यक्ष एकही माणूस फिरकला नाही.शेवटी ८/१० तास उलटून गेल्यानंतर इमारती समोर भाजी विकणारा भाजीवाला त्याचे मित्र घेऊन मदतीला आला.

काही मंडळी तर अशी आहेत की घरात आणलेले/ केलेले किंवा आत्ता जे खायचे ते  पदार्थ देवाला नैवेद्य दाखवावा त्या प्रमाणे मोठ्या निष्ठेने फेसबुक वर पोस्ट केल्या शिवाय खात नाहीत.

मला तर हा प्रश्न पडतो आपणच आपले आयुष्य इतके सार्वजनिक ( जुन्या काळातील भाषेत सांगायचे तर चव्हाट्यावर मांडणे ) का करतो?

या काही घटना व सध्या फेसबुकवर जे सगळे बघायला मिळते ते बघून मन सुन्न होते.आणि वाटते समोरा समोर माणसांशी न बोलणारे आपण कुठे चाललो आहोत?कुठे पोहोचणार आहोत?आणि नवीन पिढीला कोणते संस्कार देणार आहोत?

हे सगळ्या घटनांनी माझ्या मनात अनेक तरंग उमटले.तरंग कसले वादळच उठले.आणि वाटले आपल्याच मंडळींना थोडे सावध करावे.नाहीतरी विष हे प्रत्येकाने थोडेच अनुभवायचे असते? त्या वरचे लेबल किंवा कोणी सांगितले तर आपण विश्वास ठेवून त्या पासून दूर जातोच की.तसेच लेबल दाखवण्याचा मी थोडा प्रयत्न केला.

माझी अगदी मनापासून विनंती आहे.ही सगळी साधने जगाची माहिती मिळवणे.परदेशातील आपल्या व्यक्तींशी संपर्क साधणे.चांगले विचार,चांगले कार्य यांचा प्रसार करणे.अशा कारणांसाठी करावा.माझी आजी कायम म्हणायची आपण आपलं जपावं आणि यश द्यावं घ्यावं हे अगदी पटते.

एक गाणे आठवते सावधान होई वेड्या सावधान होई आणि हीच सर्वांना विनंती आहे.

धन्यवाद

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सोशल मीडिया पासून सावधान… भाग – १ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ सोशल मीडिया पासून सावधान… भाग – १ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आज फक्त Whatsapp विषयी बघू या.पुढील काही वाक्ये बघू.विशेषत: महिलांनी लक्षात घ्यावे.

▪️ डी पी छान आहे.

▪️ Good morning

▪️ काय चालले आहे

▪️ आज काय केले?

▪️ फारच सुंदर डिश

▪️ मग फुलांच्या इमेज

▪️ एकाच ग्रुप वर असेल तर कोणतीही पोस्ट लाईक करणे.

▪️ किती अप्रतिम लिहिता.

▪️ फोन वर बोलू या

हे असे हळूहळू वाढत जाते.किंवा कधीकधी एकतर्फी गैरसमज पण करून घेतले जातात.जसे पोस्ट लाईक केली म्हणजे मी आवडले/आवडलो.संभाषण कसे वाढते हे खूप बघितले आहे. त्यातून उगाच दिवा स्वप्ने पाहिली जातात.जे घडलेच नाही पण मनात असते ते सांगितले जाते.किंवा काही कामा निमित्त फोन झाला तरी अमुक व्यक्ती मला सगळे सांगते.असे समज करून घेणे.या सगळ्यात एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे जे कौतुक घरातून मिळत नाही ते मिळू लागले की माणूस त्यात वाहवत जातो.हे सगळे फक्त पुरुष करतात असे नाही.सध्या हे प्रमाण ५०/५०% झाले आहे.बरेच जण या आभासी जगाला खरे मानतात.आणि मानसिक संतुलन गमावतात.

पण हे सगळे चालू असताना डोळे, कान,बुध्दी सगळे उघडे ठेवावे.साधे विचार या आभासी जगाचे वास्तव दाखवतात.साध्या ओळखीवर फुले,good morning येऊ लागले तर हा विचार करावा या व्यक्तीने हे कितीतरी जणींना/जणांना पाठवलेले असू शकते.किंवा असे संभाषण किती व्यक्तींशी चालू असेल.सुरुवातीलाच हा विचार करून बंदी घातली तर पुढचे सगळे टाळता येते.ज्या व्यक्ती फक्त Dp मध्ये बघतो त्यावर विश्वास कसा ठेवायचा?तो फोटो कोणाचाही असू शकतो.किंवा १० वेळा एडिट करून सुंदर बनवलेला असू शकतो.काही दिवसा पूर्वी एक तक्रार आली होती.शोध थोडा तपास लावला तर वेगळेच सत्य समोर आले.त्या महिलेचे अकाऊंट व फोन तिचा नवरा वापरून पुरुषांना नको ते मेसेज करत होता.आणि पुरुष त्यात वाहवत होते.असे संभाषण करून त्याने अनेक लोकांकडून पैसे घेतले होते.असे बरेच वेगवेगळे किस्से माझ्याकडे आहेत.

म्हणून सर्वांना विनंती आहे,या कडे फक्त एक करमणुकीचे साधन म्हणून बघावे.चांगले असेल ते घ्यावे.आणि कोणत्याही भ्रमात राहू नये.येथील ओळखी लाटांप्रमाणे येतात.आणि ओसरतात.मी ९५० नंबर ब्लॉक केले आहेत.

त्या पेक्षा वाचन,व्यायाम,पदार्थ बनवणे,जवळचे मित्र,मैत्रिणी यांच्यात जाणे.कुटुंबात गप्पा मारणे.गाणी ऐकणे,फिरणे,सहलीला जाणे हे करावे. व या आभासी जगा पासून सांभाळून रहावे.

माझ्या कडे समुपदेशनासाठी ज्या व्यक्ती येतात त्यांच्या अनुभवातून हे लिखाण केले आहे.

क्रमशः...

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ब्रायटनची ब्राईट कहाणी…! ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ ब्रायटनची ब्राईट कहाणी… ! ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

युद्धात धारातीर्थी पडलेल्या भारतीय सैनिकांचे स्मारक भारतात असणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. ते आपले कर्तव्यही आहे. भारतात युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय युद्ध स्मारक नुकतेच इंडिया गेटजवळ बांधण्यात आले आहे. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे स्मारक कारगिलजवळ द्रास या ठिकाणी आहे. आपले कुटुंब, सणवार सगळं सगळं बाजूला ठेवून कोणत्याही देशाचे सैनिक प्रतिकूल परिस्थितीही आपले कर्तव्य बजावत असतात. या सैनिकांचा सन्मान करणे, त्यांच्या प्रति कृतज्ञ राहणे हे सरकारचे आणि आपलेही परम कर्तव्य आहे. भावी पिढीला त्यांच्या त्यागापासून प्रेरणा मिळावी हाही एक त्यामागील उद्देश असतो.

पण आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की पहिल्या महायुद्धात इंग्लंडसाठी लढणाऱ्या भारतीय सैनिकांचे एक अतिशय सुंदर स्मारक इंगलंडमधील ब्रायटन या शहराजवळ आहे. इंग्लंडमध्ये ज्या ठिकाणी हे स्मारक आहे अशा ब्रायटन गावाची आधी आपण थोडक्यात माहिती घेऊ. ब्रायटन हे इंग्लंडच्या दक्षिणेला समुद्रकिनारी वसलेले एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य गाव. ब्रिटिशांसाठी एक पर्यटन केंद्रच ! आपल्याकडील महाबळेश्वर, माथेरान, पाचगणीची आठवण यावी अगदी तसे. इंग्लंडमधील उमराव, सरदार, उद्योगपती आणि श्रीमंत लोक यांचे या ठिकाणी बंगले. ते सुटी घालवण्यासाठी या ठिकाणी येत. याच ठिकाणी इंग्लंडचा  राजपुत्र असलेल्या चौथ्या जॉर्जने एक बंगला विकत घेतला. हा बंगला आणि त्याचा परिसर अतिशय  विस्तीर्ण होता. कलेची आवड असणाऱ्या जॉर्जने या बंगल्याचा कायापालट केला. बाहेरून भारतीय वास्तुकलेचा आणि आतून चिनी सजावटीचा हा बंगला एक उत्कृष्ट नमुना बनला. या बंगल्याचे नाव मरीन पॅव्हिलियन असे पडले. पुढे हा बंगला ब्रायटनच्या स्थानिक पालिकेने इंग्लंडच्या राजाकडून चक्क विकत घेतला.

एकोणिसाव्या शतकात युरोपातील राजकीय परिस्थिती झपाट्याने बिघडत गेली. वातावरण ढवळून निघाले. ऑस्ट्रियन-हंगेरीचा सम्राट फर्डिनांड आणि त्याची गरोदर पत्नी यांची हत्या झाली आणि पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली. इंग्लंड, फ्रांस, रशिया, जर्मनी आणि दोस्त राष्टे असे गट युरोपात तयार झाले. ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध दंड ठोकले. जर्मनीने ऑस्ट्रियाचा पक्ष घेतला, तर रशिया सर्बियाच्या बाजूने रणांगणात उतरला. लवकरच फ्रान्सने रशियाला आपला पाठिंबा जाहीर केला आणि लष्करी हालचाली मोठ्या वेगाने सुरू केल्या. जर्मन फौजा बेल्जियममार्गे फ्रान्सपर्यंत येऊन धडकल्या आणि मग फ्रान्सचे दोस्त राष्ट्र इंग्लंडसुद्धा या युद्धात सामील झाले.

आतापर्यंत ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नाही अशी प्रतिमा असलेल्या इंग्लंडला जेव्हा प्रत्यक्ष युद्धात उतरावे लागले तेव्हा त्यांची खरी पंचाईत झाली. युद्धात सहभागी होण्यासाठी पुरेसे सैन्य इंग्लंडकडे नव्हते. सैन्यात नवीन भरती करून प्रशिक्षण देणेही त्यांना शक्य नव्हते. अशा परिस्थितीत भारत हा देश म्हणजे इंग्लंडच्या हातात असलेला हुकमी एक्का होता. भारतीय सैन्याची मदत मिळवण्यासाठी इंग्लंडने एक धूर्त चाल खेळली. पहिल्या महायुद्धात आपल्याला मदत केली तर आपण भारताला स्वायत्तता देऊ असे ब्रिटिशांनी जाहीर केले आणि लाखो भारतीय सैनिक इंग्लंडसाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यासाठी तयार झाले.

३० सप्टेंबर १९१४ ला भारतीय सैनिकांची पहिली तुकडी फ्रान्समध्ये दाखल झाली. त्यानंतर यथावकाश आणखीही भारतीय सैन्याच्या तुकडया दाखल झाल्या. फ्रान्स आणि बेल्जीयमच्या आघाड्यांवर जर्मन सैनिकांशी प्राणपणाने लढू लागल्या. वातावरण अत्यंत प्रतिकूल होते. हाडे गोठवणारी थंडी होती. अंगावर पुरेसे गरम कपडे नव्हते. खायला धड अन्न मिळत नव्हते. अशा वातावरणात भारतीय सैनिक इंग्रजांच्या बाजूने लढले. लाखो सैनिक धारातीर्थी पडले तर हजारो सैनिक जखमी झाले. या जखमी झालेल्या सैनिकांना परत भारतात पाठवणे शक्य नव्हते. फ्रान्स किंवा बेल्जीयममध्येही त्यांच्या उपचारासाठी काही सोय करणे शक्य नव्हते.अशा परिस्थितीत त्यांना इंग्लंडच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या ब्रायटन या ठिकाणी ठेवण्याचे ठरले. हे ठिकाण युद्धभूमीपासून फार लांब नव्हते. शिवाय येथील शांत आणि निसर्गरम्य वातावरणात या सैनिकांना लवकर बरे वाटेल असे इंग्रज सरकारला वाटले.

या सैनिकांच्या उपचारासाठी मोठया आणि सुयोग्य जागेची आवश्यकता होती. ब्रायटन येथे उपचार करायचे ठरले तेव्हा हा राजवाडा म्हणजेच मरीन पॅव्हिलियन हेच ठिकाण राज्यकर्त्यांच्या डोळ्यासमोर आले. मग ताबडतोब येथील उंची फर्निचर आणि इतर सामान हलवून सैनिकांसाठी बेडची व्यवस्था करण्यात आली. जवळपास दोन हजार जखमी भारतीय सैनिकांवर या ठिकाणी उपचार करण्यात आले. यातील बरेचसे सैनिक उपचारांती बरे झाले. फक्त ५७ सैनिक अतिगंभीर जखमा किंवा आजारामुळे दगावले. या ठिकाणी भारतीय सैनिकांवर अनेक ब्रिटिश डॉक्टरांनी उपचार केले. भारतीय सैनिकांची व्यवस्था ब्रिटिशांनी अतिशय उत्तम ठेवली. हिंदू आणि शाकाहारी सैनिकांसाठी वेगळे स्वयंपाकघर, वेगळे आचारी यांची व्यवस्था त्यांनी केली. मुस्लिम सैनिकांसाठी स्वयंपाकाची वेगळी व्यवस्था होती. प्रत्येकाला आपल्या आवडीप्रमाणे जेवण मिळेल याची व्यवस्था केली गेली. भारतीय सैनिक या ठिकाणी उपचार घेत असताना स्थानिक इंग्रज लोक त्यांच्या भेटीसाठी येत. त्यांच्यासाठी भेटवस्तू आणत असत. या दरम्यान या स्थानिक इंग्रज लोकांमध्ये आणि भारतीय सैनिकांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध दृढ झाले.

स्थानिक लोकांबरोबरच या राजवाड्यातील रुग्णालयाला इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज आणि त्याची पत्नी मेरी यांनी २५ ऑगस्ट १९१५ रोजी भेट दिली. त्यांनी या शूर सैनिकांचा आपल्या हस्ते गौरव केला. जखमी झालेल्या सैनिकातील दहा सैनिकांचा मानचिन्ह देऊन सन्मान केला. या सैनिकातीलच एक असलेल्या हवालदार गगन सिंग याचा ‘ इंडियन ऑर्डर ऑफ मेरिट ‘ हा पुरस्कार देऊन गौरव केला. या गगन सिंगचा पराक्रम पाहिल्यानंतर आपण स्तिमित होतो. मला तर त्याच्या पराक्रमाबद्दल वाचताना खिंडीत एकट्याने मुघल सैन्याशी लढणाऱ्या बाजी प्रभूंची आठवण झाली. गगन सिंग अत्यंत शूर सैनिक होता. त्याच्या हातात बंदूक असताना त्याने अनेक जर्मन सैनिकांना अचूक टिपले. पण दुर्दैवाने त्याच्या बंदुकीतील गोळ्या संपल्या. पण या पठ्ठयाने हार मानली नाही. आपल्या बंदुकीला बेयोनेट लावून त्याने त्याच्या साहाय्याने आठ जर्मन सैनिकांना यमसदनी पाठवले. पुढे एक वेळ अशी आली की त्याच्या बंदुकीचे बेयोनेटही तुटले. तेव्हा तेथेच पडलेल्या एका जर्मन सैनिकाची तलवार उपसून त्याने युद्ध सुरूच ठेवले. या भयंकर धुमश्चक्रीत तो जबर जखमी झाला आणि रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. तरी तो दोन दिवस युद्धभूमीवरच पडून होता. शेवटी इतर सैनिकांनी त्याला उचलून सुरक्षित ठिकाणी हलवले आणि नंतर रुग्णालयात दाखल केले. अशा सैनिकांची हकीगत वाचताना अक्षरशः थरारून जायला होते.

या दरम्यान जे सैनिक मृत झाले त्यांच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था ब्रिटिशांनी अतिशय चोख केली. हिंदू सैनिकांसाठी अग्निदहन करणे तसेच मुस्लिम सैनिकांसाठी दफनाची व्यवस्था करण्यात आली. जेथे या सैनिकांचा अंत्यसंस्कार करण्यात आला ते ठिकाण होते ब्रायटन जवळचे पॅचम नावाचे उपनगर. या ठिकाणी या धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ एक स्मारक इंग्रज सरकारतर्फे उभारण्यात आले. त्याला ‘ ब्रायटनची छत्री ‘ असे म्हटले जाते. छत्री हा शब्द इंग्रजांनी देखील स्वीकारला आहे. या स्मारकाच्या ठिकाणी नदीकाठी घाट असतो तसे गोल कट्टे आहेत. त्यावर ग्रॅनाईट बसवला आहे. देवळासारख्या मजबूत आणि रुंद खांबावर ही वास्तू उभी आहे. वरती सुंदर असा संगमरवरी घुमट आहे.

या स्मारकाचे उदघाटन पंचम जॉर्ज यांचे चिरंजीव प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी केलेल्या भाषणात त्यांनी भारतीय सैनिकांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. ते म्हणतात, ” ही लढाई कुठल्या कारणासाठी लढली जात आहे याची पुरेशी कल्पना नसताना आणि या कारणांशी तसा त्यांचा काही एक वैयक्तिक संबंध नसताना आपल्या भारतीय बंधूनी जो अतुलनीय त्याग केला, त्याची जाणीव भावी पिढयांना राहावी म्हणून हे स्मारक आम्ही कृतज्ञतापूर्वक उभारत आहोत. ” या छत्रीसमोर दरवर्षी ब्रिटिश शासनातर्फे मानवंदना दिली जाते. यावेळी तेथील मोठमोठे नेते, मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी देखील उपस्थित राहतात. आपले भारतीय वीर या ठिकाणी चिरनिद्रा घेत आहेत. त्यांच्या त्यागाचा यथायोग्य सन्मान ब्रिटिश सरकारतर्फे होतो. आपल्या देशाला इंग्रज पुढे स्वायत्तता देतील या आशेने हे सैनिकी पहिल्या महायुद्धात सामील झाले होते. आपले घरदार, देश, मुलेबाळे सोडून परक्या मुलखात येऊन त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. हे सगळे पाहिल्यानंतर, वाचल्यानंतर आपले मस्तक आदराने झुकते आणि ऊर अभिमानाने भरून येतो. या वीरांना सलाम !

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गौरव गाथा श्वानांची… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ गौरव गाथा श्वानांची… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

अनादी ,अनंत काळापासून कुत्रा हा प्राणी ज्याला माणसाने सर्वप्रथम पाळीव प्राणी बनविले. तो माणसाळला आणि माणसाचा उपकार कर्ता झाला .कुत्रा हा इमानदार आणि स्वामिनिष्ठ असा प्राणी आहे .माणसाच्या प्रेमाच्या मोबदल्यात, तो आपले सारे इमान आणि निष्ठा आपल्या मालकाला अर्पण करतो. त्याच्या इमानदार आणि प्रामाणिक स्वभावामुळे तो माणसाच्या जास्त जवळ आला. कुत्रा, ज्याला आपण श्वान असेही म्हणतो. त्याला माणसाच्या डोळ्यांकडे पाहून माणसाचे हावभाव ओळखता येतात. त्याची वासाची क्षमता माणसाच्या 1000 पट आणि ऐकण्याची क्षमता माणसाच्या पाचपट जास्त असते. त्यामुळे गुन्हे शोधून काढण्यासाठी ,कुत्र्यांना शिकवून तयार केले जाते. श्वानांची हुशारी, कर्तृत्व , पराक्रम आणि त्यांनी गाजविलेल्या मर्दुमकीची उदाहरणे किती सांगू तितकी कमीच ! पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातले , आणखी इतरही ठिकाणचे पराक्रम ऐकून त्या श्वानांना खरोखरच मनोमन सलाम करावासा वाटतो. सलाम.

अमेरिकन नाविक सैनिक “डिन मार्क” हा अडीच वर्षानंतर घरी परतला. त्याने आनंदाने आणि गहिवरत आईला मिठी मारली .आईला म्हणाला, ” आज मी तुझ्यासमोर दिसतोय तो केवळ परमेश्वरी कृपा .म्हणजे मूर्तीमंत परमेश्वरी कुत्र्यामुळे. आईला उलगडा होईना . तेव्हा त्याने घडलेल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. अमेरिकन नाविक सैनिकांनी जपानने जिंकलेल्या न्यू गीनीतील एका बेटावर पाय ठेवला .तो “सिझर ” या अल्सेशियन कुत्र्याला सोबत घेऊनच .एका पायवाटेवर शत्रूने भूसुरुंग पेरून ठेवलेले होते .त्याच वाटेने  “सिझर ” पुढे आणि सैनिक मागे असे चालू लागले. सुरुंग ठेवलेल्या जागा सीझर नाकपुड्या फुगवून पुन्हा, पुन्हा  हुंगायला लागला. तत्परतेने असे सुरुंग काढून टाकून सैनिकांना पुढे जाणे सोपे झाले. एका ठिकाणी एका  झुडूपात दबा धरून बसलेल्या जपानी सैनिकाची ” सिझरला” चाहूल लागली. गुरगुरत त्या बाजूला तो पाहायला लागला. अमेरिकन सैनिकांनी मशीन गन आणि हँड ग्रेनेडचा, त्या दिशेने भडीमार केला .नंतर पाहतात तो कितीतरी जपानी सैनिक शस्त्रांसह मरून पडलेले दिसले. एक आश्चर्य सांगायचे म्हणजे, एक जपानी सैनिक हातातील मशीन गन टाकून शरण आला. ( जपानी सैनिक शरण येत नाहीत, तर हाराकिरी करतात .) शरण येण्याचे कारण त्याला विचारले, तेव्हा त्याने उत्तर दिले ,”तुमचा हा इतका देखणा आणि सुंदर कुत्रा कदाचित मरेल. म्हणून मी गोळीबार केला नाही. यालाच म्हणतात श्वानप्रेम .! ‘डिन मार्क’ ने “माझे प्राण कुत्र्यामुळे , ‘ सीझर’ मुळे वाचले .तोच खरा  माझा प्राण दाता असे उद्गार काढले .

‘ चिप्स ‘ नावाचा हा असाच एक कुत्रा . दुसऱ्या महायुद्धात असामान्य कामगिरी आणि धीटपणाबद्दल खूप गाजला. अमेरिकेच्या तिसऱ्या पायदळ तुकडी बरोबर उत्तर आफ्रिकेत  ‘कैसा ब्लांका ‘ या बंदरावर उतरला. पुढे दोस्त सैन्य जर्मनीने व्यापलेल्या, इटली देशाच्या दक्षिण प्रांतातील , सिसेलीत उतरले. जर्मन सैन्या बरोबर झालेल्या लढाईत, ‘ चिप्स ‘ चे काम अत्यंत महत्त्वाचे होते. रणधुमाळीत एका जर्मन सैनिकाला ,त्याने मशीनगन सह पकडून आणले .आणि त्याच्या संपूर्ण  प्लॅटूनला शरण येण्यास भाग पाडले .रात्रीच्या काळोखात पुढे येणाऱ्या जर्मन सैनिकांची चाहूल घेऊन ,त्याच्या मूक भाषेत तो इशारा देत असे .आणि अनेक जर्मन सैनिक पकडले जात असत. पुढे 1943 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट आणि इंग्लंडचे पंतप्रधान चर्चिल यांची ‘कैसाब्लांका ‘येथे बैठक झाली. तेव्हा हाच  ‘ चिप्स ‘, बाहेर इतर सैनिकांच्या बरोबर खडा पहारा देत होता .आणि आपले काम चोख बजावत होता.

‘ डिक’ हा असाच एक गाजलेला कुत्रा. पॅसिफिक मधील एका बेटावर ,अमेरिकन सैन्याबरोबर उतरला. 53 दिवसांच्या लढाईत , 48 दिवस त्याच्या कामगिरीची लष्करात प्रशंसा केली गेली. दाट जंगलात लपून असलेल्या जपानी चौक्या त्याने दाखवून दिल्यामुळे, त्या नष्ट करणे अमेरिकन सैन्याला शक्य आणि सोपे झाले. विशेष म्हणजे या लढाईत ,एकही अमेरिकन सैनिक जखमी सुद्धा झाला नाही. त्याचं श्रेय  ‘ डिकला ‘नक्कीच जातं.

‘अँड्री ‘  हा डॉबरमॅन कुत्रा, ‘ओकिनावा’  च्या लढाईत अमेरिकन सैन्याबरोबर दाखल होता .या लढाईत बरेच अमेरिकन सैनिक मारले गेले .पण  ‘अँड्री ‘न घाबरता ,न डगमगता सर्वात पुढे जाऊन धोका हेरत असे . तीक्ष्ण नाकामुळे त्याला शत्रूची चाहूल हल्ला होण्यापूर्वीच लागत असे. त्यामुळे अनेक सैनिकांचे प्राण वाचले .अनेक सैनिकांचे प्राण वाचविणाऱ्या त्याच लढाईत एका गोळीने वीर मरण आले. सलाम त्या रणवीराला ! सलाम.

   ‘ फिप्का ‘ , हा एक जवान ( कुत्रा ) दुसऱ्या महायुद्धात, पाचव्या अमेरिकन दलाबरोबर, फ्रान्सच्या रणांगणावर उतरला. शत्रूची धोक्याची हालचाल नाकाच्या साहाय्याने दर्शविण्यात तो निष्णात होता. मातीत लपवून ठेवलेली विजेचे तार त्याला दिसताच ,त्याने दुरूनच भुंकून भुंकून धोका नजरेस आणून दिला. लगेच तो धोका नष्ट करण्यात आला. नंतर असे आढळून आले की, त्या तारेला जोडलेले तीन सुरूंग एकदम उडवून अनेक सैनिक गारद झाले असते .पण शेकडो सैनिकांचे प्राण वाचविणाऱ्या, ‘फिप्का” ला एका हात बॉम्ब मुळे प्राण गमवावा लागला . तो शहीद झाला .सलाम त्याच्या कर्तव्य पुर्तीला .नुकतंच वाचनात आलं करटणी बडझिन (अमेरिका ) नावाच्या महिलेचा ‘ टकर ‘ नावाच्या गोल्डन रिट्रीवर जातीच्या कुत्र्याची वार्षिक कमाई, आठ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे .तो एका जाहिरात कंपनीसाठी मॉडेलिंग करतो. त्यासाठी त्याला एक लाख डॉलर मिळतात. त्याला एका जाहिरातीसाठी पोज देण्याचे 6656 ते अकरा हजार 94 डॉलर (अंदाजे 55 ते 92) लाख रुपये मिळतात .इतके प्रचंड कमाई करणारा हा जगातील एकमेव कुत्रा आहे. तो आठ महिन्याचा असल्यापासून जाहिरात कंपनीसाठी मॉडेलिंग करतो.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आषाढी वारी विशेष – “वारकरी संप्रदायाचे कार्य…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ आषाढी वारी विशेष – “वारकरी संप्रदायाचे कार्य…” ☆ सौ राधिका भांडारकर

उत्कट भक्ती, सदाचार, नीती यावर आधारलेला सरळ मार्गी  आचारधर्म म्हणजे वारकरी संप्रदाय.

विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांच्या संप्रदायाला वारकरी संप्रदाय म्हणतात. आणि या संप्रदायाचा आद्य प्रवर्तक भक्त पुंडलिक समजला जातो.

वारी म्हणजे एक सामुदायिक पदयात्रा.  विठ्ठलाच्या दर्शनासाठी आपापल्या गावाहून वारकरी या पदयात्रेत भक्तिभावाने सामील होतात.

संत ज्ञानेश्वरांच्या घराण्यात वारकरी संप्रदायाची  परंपरा होती आणि संत नामदेव,  संत तुकाराम, संत एकनाथ, संत भानुदास यांनी हाच प्रवाह चालू ठेवला.

या वारीची प्रथा आजतागायत त्याच भावनेनेने टिकून आहे हेच खरे वारीचे महात्म्य.  भगवंतांचे नामस्मरण करणे हे या संप्रदायाचे मुख्य तत्व.  संसारातील बंधनातून,  मोहमायेतून हळूहळू दूर होऊन,  भजन कीर्तनाच्या माध्यमातून, नामस्मरण करून  पांडुरंगाशी  एकरूप व्हावे हा संप्रदायाचा साधा सोपा भक्ती मार्ग आहे.  वारकरी संप्रदाय म्हणजे एक संस्कारक्षम सांस्कृतिक केंद्र आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही.

या संप्रदायाचे प्रवेशद्वार सर्व जाती पंथांच्या स्त्री-पुरुषांसाठी खुले आहे.  जातीय समता हा या संप्रदायाचा कार्य केंद्रबिंदू आहे.  येथे उच्च, नीच,  गरीब,  श्रीमंत असा भेदभाव नाही.  येथे सर्व समान.  सर्वांचे स्थान एकच.  शास्त्रप्रामण्याला, जातीव्यवस्थेला धक्का न लावता स्त्री व शूद्रांना आत्मविकासाचा मार्ग या संप्रदायाने मोकळा करून दिला. स्वातंत्र्य व समतेचे वातावरण निर्माण केले.  भक्ती पंथांच्या साहाय्याने आध्यात्मिक उन्नती साधता येते, नैतिक सामर्थ्य वाढवून प्रापंचिक  दु:खावर मात करता येते असा विश्वास या वारकरी पंथाने लोकांप्रती निर्माण केला.

वारकरी संप्रदायात व्रत—वैकल्याचे स्तोम नाही.  कर्मठपणा नाही.  त्याग, भोग,  नैष्कर्म्य,  स्वधर्माचरण याचा मेळ घालण्याचा उपदेश यात आहे.  या संप्रदायाचे कार्य लोकाभिमुख आहे.  लोकांमध्ये राहून नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न यात आहे.  श्रद्धा व विवेक यांच्या एकात्मतेवर भर देण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.  प्रपंच व परमार्थ याचा समन्वय साधण्याची शिकवण हा संप्रदाय समाजाला  देतो.  त्यांचे एकच सांगणे असते की कर्तव्यनिष्ठेला व सामाजिक नीतिमत्तेला पोषक अशीच कर्मे करावीत.  एकनाथ महाराज, चोखामेळा, गोरा कुंभार, सावता माळी सारेच वारकरी संत गृहस्थाश्रमी व कुटुंब वत्सल होते.

।। आधी प्रपंच करावा नेटका।। ही शिकवण त्यांनी समाजाला दिली. स्त्रियांच्या आणि शूद्रांच्या जीवनातलं जडत्व नाहीसं करून त्यांच्या निरस जीवनाला आध्यात्मिक ज्ञानाची ओळख करवली.  आणि त्यांच्या सुप्त शक्तींची व भावनांची जाणीव त्यांना  करून दिली.

वारकरी संप्रदायाने मराठीचा अभिमान बाळगला.  बोलीभाषेला वाङमयीन प्रतिष्ठा मिळवून दिली.  वारकरी संतांनी बहुजन समाजासाठी प्रथम मराठीत लेखन केले.  फुगड्या, पिंगा, भारुडे, गवळणी, अभंग, ओव्या, कीर्तने यांच्या माध्यमातून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले. लोकांना रुचेल, समजेल,  त्यांच्या ओठावर राहील असेच लेखन त्यांनी केले.

। वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा।

। येरानी  वहावा भार माथा ।।

असे संत तुकाराम आत्मविश्वासाने समाजाला सांगतात.

थोडक्यात वारकरी संप्रदायाने सामाजिक समतेचा पाया रचला.  तुळशी माळ, बुक्का,  गोपीचंदन,  गेरूच्या रंगात बुडवून तयार केलेले जाड्या भरड्या कापडाचे,  विशिष्ट आकाराचे निशाण म्हणजे संप्रदायाची पताका ही वारीच्या उपासनेची साधने आहेत.  

संप्रदायाचे मुख्य दैवत श्री विठ्ठल.  आणि हे कृष्णाचे रूप आहे.

 राम कृष्ण हरी हा वारकऱ्यांचा महामंत्र.

आणि “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्रीगुरु  ज्ञानदेव तुकाराम” हे वारकरी संप्रदायाचे घोषवाक्य आहे.

टाळ मृदंगाच्या गजरात,  उन्हातान्हात,  पावसात,  थंडी वाऱ्यात,  ही वारी निघते आणि एकात्मतेची जागृती समाजात निर्माण करत भगवंत चरणी लीन होते.

।। राम कृष्ण हरी ।।

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “त्या तीन कविता…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

“त्या तीन कविता…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

आपल्याला वाचनाची गोडी असली की आपण वेळ मिळेल तेव्हा,वाचायला जे मिळेल ते अधाशासारखं वाचीत असतो.वाचतावाचता काही साहित्य मात्र मेंदूच्या कप्प्यात, ह्रदयाच्या गाभाऱ्यात अलवार जाऊन विराजमान होतं आणि कायमस्वरूपी ठाणच मांडून बसतं. वाचतांना एक गोष्ट लक्षात आली लेखन करतांना पद्यरचना जरा तरी लिहावयास सुलभ कारण आपल्याला जे सांगायचं असतं त्यासाठी भरपूर लेखन आपण करु शकतो पण त्यामानाने गद्यलेखन मात्र जरा अवघड, किचकट कारण अत्यंत कमी शब्दांत आपल्याला सगळं सार उलगडून सांगावं लागतं. त्यामुळेच कविता,चारोळ्या करणाऱ्या मंडळींच जरा जास्त कौतुक वाटतं.

अशाच तीन कविता माझ्या डोक्यात फिट बसल्यात, मनात घर करून बसल्यात. त्या तीन कविता म्हणजे प्रणय पत्रिका, चाफा बोलेना आणि गाई पाण्यावर…..

दरवेळी ह्या कविता वाचतांना, ऐकतांना नव्यानेच ऐकल्यागत एक वेगळीच ओढ,उर्मी जाणवते. मग अजून अभ्यास करता लक्षात आलं की ह्या तिनही कवितांचा रचयिता ही एकच व्यक्ती आहे.आज ह्या कवीचा जन्मदिन.  त्यांना विनम्र अभिवादन.

कवी “बी” म्हणजेच कवी नारायण मुरलीधर गुप्ते ह्यांनी प्रणय, कौटुंबिक, ऐतिहासिक व सामाजिक विषयांवर कविता केल्या आहेत.  मी मागेच कवी बी ह्यांच्या विषयीचा समग्र लेख त्यांच्या दोन  कवितांबद्दल लिहीला होताच. आज त्यांच्या प्रणय पत्रिका ह्या कवितेबद्दल विचार करू.

त्यांची पहिली कविता ‘प्रणय पत्रिका‘ ही वर्‍हाडात चिखलदरा येथे दिनांक १४ सप्टेंबर १८९१ रोजी लिहिली गेली. त्यावेळी ते सुमारे १९ वर्षांचे असावेत. अवघं एकोणवीस वर्षांचे वय,त्यावेळेचा काळ आणि विषय प्रणय पत्रिका म्हणजे एक धाडसचं. अजूनही ह्या विषयाच्या उल्लेखाने भु्वया ह्या उंचावल्या जातात. त्याकाळी हा विषय हाती घेणं म्हणजे एक दिव्यच. ही कविता त्याच वर्षी कै. हरिभाऊ आपटे यांच्या ‘करमणूक’ पत्रात प्रसिद्ध झाली.

अनेक दिवस झाले तरी प्रियकराची क्षेमकुशल सांगणारी खबरबात असलेले पत्र  आले नाही म्हणून जरा बावरलेल्या,चिंताग्रस्त  प्रेयसीने आपल्या प्रियकराला लिहिलेले पत्र म्हणजे ‘प्रणय पत्रिका’..काय नसतं ह्या भावनेत, एक उत्कटता,काळजी,प्रेम ,घालमेल ह्या सगळ्याचा अविष्कार.

किति तरि दिन झाले ! भेट नाही पदांची,

करमत मज नाही; वेळ वाटे युगाची.।।

ह्या ओळींवरुन बरेच दिवस भेट न झाल्याने होणारी तगमग,ओढ जाणवते.भेट न झाल्याने क्षण न क्षण हा हळूहळू युगासारखा भासू लागतो.

    तरल मन नराचे राहते ऐकते मी

    विसर बघुनि पावे अन्य पात्रास नामी.

    ह्या तरल भावनेचा,मानसिकता गुंतवणूकीचा

विसर तर पडला नसेल ना ह्या भितीने मनात घर केल्या गेल्यावर ह्या ओळी सुचतात.

     कमलिनि भ्रमराला नित्य कोशात ठेवी

      अविरत म्हणुनी तो पंकज प्रेम दावी.

 

     विसर पडुनि गेला काय माझाही नाथा ?

     म्हणुनिच धरिले हे वाटते मौन आता

त्या भ्रमराला नित्य सहवासात म्हणजे कोषात ठेवल्याने हे प्रेम वाढीस लागतं .तुझं हे मौन प्रेमाचा विसर पडल्याचं द्योतक तर नाही ही भिती वारंवार जाणवते.

ह्यात एक दुसराही गहन अर्थ लपलायं तो म्हणजे प्रेयसीचा उद्वेग, वैताग, तडफड हा प्रेमाचा एक अविष्कार तर तेवढीच तीव्रता तिचा प्राणप्रिय सखा आपल्या मौनाद्वारे मनातल्या मनात दाबून टाकतो.

“चाफा बोलेना,चाफा चालेना” ही कविता आम्हाला अकरावी,बारावीत मराठी अभ्यासक्रमात होती.खरतरं  घटना एकचं, पण निरनिराळ्या व्यक्ती ह्या घटनेकडे वेगवेगळ्या अँगलने बघतात.हे बघितल्यावर अचंबित व्हायला होतं.”चाफा”ही कविता खरतरं पूर्णतः सहजासहजी कोणाला नीटशी कळत नाही. बरेचदा वाटतं हे प्रेमगीतं असावं,तर कधीतरी अचानकच वाटायचं हे त्यापलीकडेही काहीतरी कळण्यासंदर्भात वेगळं किंवा त्यापलीकडचं पण असावं. ही आपल्यातील आपल्यावरच आपलेपणाने रुसलेली एक काव्य प्रतीभाच आहे असही कधीकधी भासून जात़ं.

तसेच “गायी पाण्यावर” ही कविता तर बापलेकीच्या नात्याचा एक सर्वोत्तम दाखलाच जणू. कळायला लागल्यानंतर बाबा ही कविता गुणगुणायचे तेव्हा बापलेकीच्या अलवार नात्यानं भडभडून यायचं.अजूनही ह्यातील ओळी कानी पडल्या तरी मन आपोआपच कातर,हळवं हे होतचं.

या तिन्ही कवितांवर लिहावे तेवढे थोडेच  आहे.कवी बी म्हटले की या तीन कविता प्रामुख्याने डोळ्यासमोर  येतात. लिहावेसे वाटले म्हणून  ‘प्रणय पत्रिके’ विषयी थोडे लिहून थांबते.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “नात…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “नात…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

जोडल तर आपल असत. तोडल तर मात्र ना….. ते….. आपल असत. आणि नाही ते समोरच्याच.

नात म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. अगदी एकमेकांच्या पाठीला पाठ लावून असतात. या दोन बाजूमुळेच नात्याला किंमत असते.

या पैकी कोणतीही एक बाजू दुसऱ्या बाजूपासून वेगळी करता येत नाही. आणि करण्याचा प्रयत्न केला तर त्याची किंमत रहात नाही.

आपण सोबत असलो तरच आपल्याला किंमत आहे हे दोन्ही बाजूंनी समजून घ्यायच असत. आणि हे सगळ्या नात्यांच्या बाबतीत आहे. बऱ्याचदा तर काही नात्यामुळेच आपली ओळख असते.

नोटांच बांधून ठेवलेल बंडल आपण अनेक वेळा अनेक ठिकाणी पाहिल असेल. जेव्हा एक एक नोट या बंडलमध्ये जाते तेव्हा प्रत्येक नोटेची किंमत जरी तेवढीच रहात असली तरी बंडलची एकूण किंमत मात्र वाढत असते. तसच या बंडल मधून नोट काढल्यावर त्या नोटेची किंमत तेवढीच रहात असली तरी बंडलची एकूण किंमत मात्र कमी होते.  यापेक्षा आणखीन काहीही वेगळ नात्यांमध्ये नसत. आपल्या नात्याची किंमत एकत्र राहिल्यानेच वाढते.

नात्यानुसार, वयानुसार व्यक्तिची किंमत वेगळी असली तरी जेव्हा ते नातं म्हणून ओळखल जात तेव्हा दोघांची किंमत असते. आणि आपल्यामुळे दुसऱ्या बाजूला किंमत राहणार आहे हे लक्षात ठेवायच असत.

लहान मुलाला चालतांना आधार म्हणून आपण आपल बोट धरायला देतो. तसच वृध्द व्यक्तीला देखील देतो. त्यांना आधाराची गरज असते ती आत्मविश्वास यावा म्हणून. आणि तो आधार दिला की आत्मविश्वास येतो हे नात शिकवत. मग ते अगदी काही वेळासाठीच असल तरी सुद्धा.      

सगळी नाती कायम स्वरुपाचीच असतात अस नाही. फक्त ते जोडायची मनाची तयारी असली पाहिजे.

नात हे बंधनात अडकवत. पण नात हे रक्ताचच असल पाहिजे अस बंधन अजीबात नसत. रक्ताच्या नात्या इतकीच घट्ट ती असू शकतात.

नात हि अशी गोष्ट आहे की ती एकाच व्यक्तीला वेगवेगळ्या नात्याने स्वतः कडे आणि इतरांकडे बघायला शिकवते. जबाबदारीची जाणीव करून देते. एक नात जोडल की अनेक वेगवेगळी नाती त्या सोबत आपोआप जोडली जातात. आणि एक तुटल की अनेक तुटतात.

नात जोडायचा मोठेपणा मनात असला की नात्यातला मोठेपणा आपोआप मिळतो. नात एकमेकांना जवळ आणत. तसच जवळ आलेली एकमेकांत नात्याने बांधली जातात.

नात मग ते कोणतेही असो. हा ठेवा आहे‌. नाती होती, आणि आहेत, ती राहतील सुध्दा…….जर आपण ती समजून घेतली, फुलवली, आणि सांभाळली तर….. नात्यात रंगलो की नाती आपोआप रंगतात. ती रंगवावी लागत नाही.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग – सुंदरता आणि कुरूपता… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ उगवतीचे रंग – सुंदरता आणि कुरूपता… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे  

(रंगसोहळा या पुस्तकातून साभार घेतलेला लेख)

बालकवी म्हणतात

सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे
चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे.

परवा श्रीकृष्ण मालिका पाहत असतानाचा एक प्रसंग आठवला. कंसाच्या आमंत्रणावरून श्रीकृष्ण मथुरा नगरीत येतो. मथुरेत फेरफटका करीत असताना, श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या दृष्टीस एक कुबड असलेली आणि त्यामुळे अत्यंत वाकून चाललेली स्त्री दृष्टीस पडते. ती कंसासाठी तयार केलेला एक सुगंधी लेप घेऊन जात असते. श्रीकृष्ण तिला थांबवून म्हणतो, ‘ हे सुंदरी, तुझ्याजवळ सुगंधी अशी कोणती वस्तू आहे आणि तू ती घेऊन कुठे जात आहेस ? ‘ तेव्हा ती म्हणते, ‘ मी कुब्जा आहे. मी कुरूप असल्यामुळे सगळे लोक मला कुब्जा म्हणतात. एक वेळ मला कुब्जा म्हटले असतेस, तर चालले असते. पण तू मला सुंदरी म्हणून माझा उपहास केला आहेस. त्यामुळे मी व्यथित झाले आहे. ” त्यावेळेस श्रीकुष्ण तिला जे सांगतो, ते मला खूप आवडले. तो म्हणतो, ‘ कुरूपता ही शरीराची असू शकते. पण तुझ्याजवळ मनाचे सौंदर्य आहे. आत्म्याचे सौंदर्य आहे. म्हणूनच मी तुला सुंदरी असे म्हटले. ‘

आपण सर्वसामान्य माणसे. वरवरचे सौंदर्य पाहण्याची सवय आपल्याला लागलेली असते. पण वरवर दिसणाऱ्या सौंदर्यापलीकडे किंवा कुरुपतेपलीकडे सुद्धा सौंदर्य असू शकते, याचा अंदाज आपल्याला येत नाही. कधी कधी मला असे वाटते की सौंदर्य आणि कुरूपता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या सापेक्ष गोष्टी आहेत. असं म्हणतात की वस्तूत, व्यक्तीत सौंदर्य नसते. सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असते. जी गोष्ट एखाद्या व्यक्तीला सुंदर वाटेल, तीच गोष्ट दुसऱ्याला तितकी आकर्षक वाटणार नाही. एखाद्या व्यक्तीला अगदी साधारण वाटणाऱ्या गोष्टीतही सौंदर्याचा साक्षात्कार होतो. गवतफुलासारखी सामान्य गोष्ट. पण एखाद्या कवीला त्यातही सौंदर्य दिसते आणि तो सहज म्हणून जातो

रंगरंगुल्या, सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे सांग लागला, सांग तुझा रे तुझा लळा.

कुरुपतेतूनही सौंदर्य जन्म घेते. काट्यांवर गुलाब फुलतात. चिखलात कमळ उगवते. ओबडधोबड अशा दगडातून सुंदर मूर्ती तयार होते. सुंदर घरांची निर्मिती होते. आंतरिक ओढ कशाची आहे ते महत्वाचे. कमळाला आतूनच फुलण्याची ओढ असते. काट्यांवर असला तरी खेद न मानता गुलाबाला फुलायचे असते. आणि ज्याला फुलायचे असते, आपले सौंदर्य जगापुढे आणायचे असते, त्याला कोणी रोखू शकत नाही. कारण ती तुमची आंतरिक ओढ असते. मग परिस्थिती कशीही असो. चिखल असो वा काटे. चिखलात फुलणारे कमळ , काट्यांवर फुलणारा गुलाब जणू आपल्याला संदेश देतात, की बघ, मी कसा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा पूर्णांशाने फ़ुललो आहे. माझे सौंदर्य जराही कमी होऊ दिले नाही. ओबडधोबड दगडातून सुंदर मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारात सुद्धा अंतरात सौंदर्याची ओढ असते. म्हणूनच अशी सुंदर कलाकृती जन्म घेते.

फुलपाखरांचा जन्म कसा होतो माहितीये ? कुरूप अशा दिसणाऱ्या अळ्यांमधून फुलपाखरे जन्म घेतात. इतक्या कुरूप अळ्यांमधून इतकी सुंदर मन मोहून टाकणारी फुलपाखरे जन्माची हा निसर्गाचा एक चमत्कारच नाही का ?

मग त्यांना जन्म देणाऱ्या अळ्यांना कुरूप तरी कसे म्हणावे ? आकाशात दिसणारे पांढरे मेघ छान दिसतात. पण त्यांचा काहीच उपयोग नसतो. काळे ढग कदाचित दिसायला सुंदर नसतील, पण आपल्या जलवर्षावाने ते अवघ्या सृष्टीला नवसंजीवनी देतात, म्हणून त्यांचे बाह्य रूप न विचारात घेता, आंतरिक सौंदर्य विचारात घ्यायला हवे. जे सौंदर्य इतरांना आनंद देते, इतरांच्या उपयोगी पडते, ते खरे सौंदर्य. इतरांसाठी जे स्वतःचं सर्वस्व झोकून देऊन काम करतात, त्यांच्या कार्याचा कीर्तिसुंगंध आपोआपच पसरतो. नुसते सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असणे महत्वाचे आहे. ही सुंदरता विचारांची आहे. कृतीची आहे.

आपल्या देवादिकांचे फोटो पाहिले तर त्यांच्या पाठीमागे एक तेजोवलय आपल्याला दिसते. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज, एक प्रकारची आभा दिसते. ते जे सौंदर्य आहे ते सत्याचे प्रतीक आहे. तेच शिव आहे आणि तेच सुंदर आहे. इंग्रजी कवी किट्स म्हणतो, ‘ Truth is beauty and beauty is truth.’ त्याचा अर्थ हाच आहे. आणि त्याचे आणखी एक वाक्य प्रसिद्ध आहे ‘ A thing of beauty is joy forever.’ जी गोष्ट सुंदर असते, ती नेहमीच आनंद देते. कृत्रिम सौंदर्य फार काळ आनंद देऊ शकत नाही. सौंदर्य प्रसाधने, पोशाख इ च्या साहाय्याने आपण आपले सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न करतो. पण जी गोष्ट मुळचीच सुंदर असते, तिला दिखाव्याची गरज असत नाही. चेहऱ्यावरचे निर्मळ आणि नैसर्गिक हास्य, आपले काम करताना भाळावर येणारे घामाचे मोती या गोष्टी सुंदरच दिसतात. आपले आरोग्य चांगले असेल, विचार चांगले असतील आणि मन प्रसन्न असेल, तर सौंदर्य तुमच्या व्यक्तिमत्त्वातून आपोआपच प्रकट होईल. त्यासाठी मेकअप किंवा दिखाव्याची गरज भासणार नाही.

‘ एका तळ्यात होती बदके पिले सुरेख …’ हे गाणं आपल्या सगळ्यांना माहिती असेल. त्या तळ्यात बदकांसमवेत एक राजहंस वाढत असतो. त्याला आपल्या सौंदर्याची जाणीव नसते. बदकांची पिले तो वेगळा असल्याने त्याला कुरूप समजतात. म्हणून तोही दुःखी असतो. पण एके दिवशी त्याला उमजते की आपण बदक नसून राजहंस आहोत, तेव्हा त्याचे भय, वेड सगळे पळून जाते. कारण त्याने त्याच्यातील ‘ स्व ‘ ला ओळखले असते. असाच आपल्या प्रत्येकामध्ये सुद्धा राजहंस दडलेला असतो. फक्त आपल्याला त्याला ओळखता आले पाहिजे, जागे करता आले पाहिजे.

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares