मराठी साहित्य – विविधा ☆ व्रतोपासना – ३. अन्नाचा स्वीकार ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

व्रतोपासना – ३. अन्नाचा स्वीकार ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

मला घरातील ज्येष्ठ मंडळी कायम स्मरणात असतात. त्यांची काही वाक्ये लहानपणी पासून ऐकतो. त्यावेळी फारसे कळायचे नाही. पण मोठ्यांना उलट प्रश्न विचारण्याचा तो काळ नव्हता. पण त्या मुळे मनावर चांगले संस्कार कोरले गेले. आणि त्यातील काही वाक्ये आत्ता लक्षात येतात आणि ती किती महत्वाची होती हे लक्षात येते. कोणत्याही पदार्थाला नकार दिला की एक वाक्य आजी कायम म्हणायची, कोणाचाही हात मोडू नये. हे ऐकून त्यावेळी आम्ही तोंडावर हात ठेवून हसत असू. मोठ्याने हसलो किंवा उलट बोलले तर मार मिळेल या भीतीने गुपचुप हसायचे. आणि हात कसा मोडतो? हा प्रश्न पडायचा. पण त्याचा अर्थ जसे वय वाढत गेले तसा लक्षात यायला लागला. आणि हे पूर्वीचे संस्कार फार महत्वाचे आहेत हेही जाणवते.

समोर आलेले अन्न आपण स्वीकारले नाही किंवा त्याला नकार दिला तर त्याचा आनादर होतो. आणि ज्या व्यक्तीने आपल्याला दिलेले असते त्या व्यक्तीचाही अपमान होतो. त्यामुळे आपल्याला न आवडणारा पदार्थ समोर आला तर त्याला कधीही नकार देऊ नये. त्याचा आदर करण्यासाठी त्यातील एखादा अल्पसा घास तरी ग्रहण करावा. मी कित्येकदा असा अनुभव घेतला आहे, की एखादा पदार्थ नाकारला तर दिवसभर काहीच खायला मिळत नाही. अगदी जवळ पैसे, स्वतःचा जेवणाचा डबा असेल तरी जेवणासाठी वेळ मिळत नाही.

अजून एक विचार असा आहे, ज्या अन्ना मुळे आपले भरण पोषण होते त्याच अन्नाने आपला अनादर केला तर? आपल्या शरीरात अन्नद्वेष निर्माण झाला तर? आपले जगणे पण अशक्य होऊन जाईल. म्हणून कोणतेही अन्न मना पासून स्वीकारावे. तरच ते चांगले पोषण करते. आपण अन्नाला व पाण्याला भावना देऊ शकतो. त्या भावना अन्न ग्रहण करते. अन्नाला सकारात्मक व चांगल्या भावना देण्यासाठी आपल्या कडे स्वयंपाक करताना पाळायचे काही नियम असतात.

त्यामुळे हे अन्नाचा स्वीकार हे व्रत म्हणून सर्वांनीच आचरणात आणावे. तेच संस्कार आपल्या मुलांवर होणार आहेत. सोपे पण महत्वाचे व्रत आहे ना? माझ्या मताशी सहमत आहात का? नक्की कळवावे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

९/११/२०२४

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “माझ्या डायरीतून…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 विविधा 🌸

☆ माझ्या डायरीतून… ☆ प्रा. भरत खैरकर 

यशस्वी होणे याचा अर्थ कधीही अपयश न येणे असा नसून अंतिम ध्येय गाठा असा आहे. बहुतेक लोक क्षमता आणि बुद्धिमत्ता यांच्या अभावामुळे अयशस्वी होतात असे नाही तर ईच्छा, दिशा, समर्पण आणि शिस्त यांच्या अभावामुळे ते अयशस्वी होतात. आपल्या अंतरंगात जे काही असते त्यामुळे आपण उंचीवर जातो. म्हणजे आपला दृष्टिकोन महत्त्वाचा असतो.

आपल्या दृष्टीकोनात बदल करून माणूस आपले आयुष्य बदलू शकतो. प्रामाणिक असणं जास्त महत्त्वाच आहे. तुम्ही प्रथम चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपोआपच तुम्हांला सद्बुद्धी लाभेल.

मनाने इतके कणखर व्हा की कुठलाही आघात तुमची मनःशांती ढळू देणार नाही. भूतकाळातील चुका विसरून भविष्यातील यशाचा विचार करा. स्वयम् सुधारणेसाठी इतका वेळ द्या की दुसऱ्यावर टीका करायची वेळच उरणार नाही!

काम उद्यावर टाकण्याच्या सवयीमुळे नकारात्मकता वाढीस लागते. बौद्धिक शिक्षणाचा प्रभाव विचारशक्तीवर पडतो तर मूल्य शिक्षणाचा प्रभाव हृदयावर पडतो.

प्रत्येक विद्यार्थ्याची विशिष्ट विषयातील गती किंवा क्षमता ओळखून जीवन जगण्यासाठीची सर्वांगीण तयारी करून घेणारे शिक्षण म्हणजे खरे शिक्षण!!

अर्धवट ज्ञान धोकादायक असते अज्ञान हे भीती हटवादीपणा, पूर्वग्रह अशा दोषांना जन्म देते. आपल्या बलस्थानांची जोपासना करणे, शिकण्याची उत्कट इच्छा बाळगणे, अत्यंत गरजेचे आहे.

सकाळची सुरवात सकारात्मक वाचनाने केली पाहिजे. आपण जर आपल्या मुलांना त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नातून समर्थ होण्यासाठी धडपडू दिले नाही तर त्यांचेच नुकसान करतो आहोत. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही,शिड कसं लावायचं हे आपण ठरवू शकतो ! माणसाच्या मनामध्ये जे रुजतं किंवा माणूस मनात जे आणतो आणि त्यावर विश्वास ठेवतो ती गोष्ट तो माणूस साध्य करू शकतो.

जास्त कष्ट कराल तितके तुम्ही जास्त नशिबवान असाल. सामान्य माणूस आपल्या शक्तीच्या आणि क्षमतेच्या फक्त एक चतुर्थांश काम करतो. जी माणसं आपल्या क्षमतेच्या निम्म्याहून अधिक क्षमतेने काम करतात त्यांना जग सलाम करते. आणि मोजकीच माणसं शंभर टक्के काम करतात त्यांना जग डोक्यावर घेतं.

कोणत्याही गोष्टीतील कौशल्य नशिबाने मिळत नाही त्यासाठी भरपूर कष्ट आणि सराव करावा लागतो. कठोर परिश्रम आणि अखंड सराव त्यामुळे माणसाच्या कामात सफाईदारपणा येतो. एक म्हण आहे “हातोड्याच्या घावाने काचेचे तुकडे होतात परंतु पोलाद घडविल्या जाते”.

एखादी गोष्ट आपल्या मनात येईल तेव्हा व तशी करणे ह्यापेक्षा जशी आणि जेव्हा करणे गरजेचे आहे त्यासाठी मनाची शिस्त असावी लागते. भावनांवर आपण मात केली पाहिजे आणि आपला आत्मविश्वास परत मिळविला पाहिजे. नकारात्मक विचाराचे लोक धोकादायक असतात. बहुसंख्य लोक आपल्या संपूर्ण आयुष्याची आखणी करण्यापेक्षा मौजमजेच्या कार्यक्रमाची आखणी करण्यात अधिक वेळ घालवतात. सामान्य असणं जेवढं सोपं आहे त्यापेक्षा उत्तम असणं कितीतरी कठीण!!

माणसाचं व्यक्तिमत्त्व हे त्याचं चालणं, बोलणं, त्याच्या आवाजातील मार्दव, आणि आत्मविश्वास यामधून जाणवतं. माणसाचा दृष्टीकोन, वर्तणूक आणि त्यातून व्यक्त होणारा भाव यांचा मिलाफ म्हणजे प्रसन्न व्यक्तिमत्व. चेहऱ्यावरचा प्रसन्न भाव आपल्या कपड्या पेक्षा अधिक प्रभाव कारक असतो!

तुम्ही जेव्हा इतरांशी चांगलं वागत असता तेव्हा तुम्ही स्वत:शीही उत्तम वागत असता. चांगुलपणा नेहमी तुमच्याकडे परत येत असतो. हा जगाचा नियमच आहे. ‘जग आहे असं आपल्याला दिसत नाही तर आपण जसे आहो तसं ते दिसतं ‘. आपली चूक आपण तात्काळ आणि सहजतेने स्वीकारली पाहिजे. हे यशस्वी जगण्याचं तत्वज्ञान आहे. ‘स्वतःला एक प्रामाणिक माणूस बनवा म्हणजे जगातील एक लबाड माणूस कमी झाला!’ त्याबद्दल तुम्ही निश्चिंत व्हाल.

मित्रांनो, ह्या काही नोंदी किंवा ते टिपणं आहेत माझ्या डायरीतील, तुमच्याशी त्या शेअर कराव्या वाटल्या म्हणून हा प्रपंच!!

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ – सुख… – ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

?  विविधा ?

☆ – सुख… – ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सुख म्हटलं की नकळत प्रशांत दामले समोर आले.. सुख म्हणजे नक्की काय असतं..काय पुण्य असतं की ते घर बसल्या मिळतं..अर्थात सुखाच्या कल्पना प्रत्येक व्यक्तीच्या वेगळ्या असतात.. कोणाला कशात सुख वाटेल हे सांगता येणं कठीण आहे.. करोडोंच्या घरात राहणाऱ्या, गाडी घोड्यातून फिरणाऱ्या,दिमतीला नोकरचाकर असणाऱ्या.. सर्व सोयी सुविधा पायाशी लोळण घेत असणारी व्यक्ती सुखी असेलच असे नाही.. ह्या उलट काही वेळा झोपडी वजा छोट्याश्या घरात राहणारी आणि उद्या काय हा प्रश्न असणारी व्यक्ती सुद्धा आजचा दिवस छान गेला ना मग झालं तर म्हणून नेहमी सुखात असलेली पहायला मिळते.. म्हणूनच तर सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना ह्या भिन्न असतात..आता माझ्या बाबतील म्हणाल तर माझी विशेष अशी जगावेगळी सुखाची काही कल्पना नाहीय.. तरीही.. पहाटेच्या शितल वाऱ्याची झुळूक.. क्षितिजावर पसरलेला लालिमा, मध्येच पक्षांचा ऐकू येणारा किलबिलाट, ह्या सगळ्यांना चार चाँद लावणारा मोगरा, जुई चा सुगंध म्हणजे सुख.. अशावेळी नुकतेच उठून आपण गॅलरीत ह्या निसर्गाचं रूप डोळ्यात साठवतो आहोत आणि आपल्या सख्या ने आपल्या हातात आयता चहा द्यावा आणि मग गप्पांची मैफिल पहाटेच रंगावी हे म्हणजे सुख… बागेत खूप दिवसांनी अचानक उमललेल एखादं गोंडस फुलं अचानक दृष्टीस पडावं हे म्हणजे सुख..स्वयंपाकघरात काम करताना तडतडनारी मोहरी आणि हिंगाचा तो घरभर भरून राहिलेला सुगंध.. आणि घरच्यांनी वा फक्कड झालीय फोडणी म्हणून केलेलं छोटंसं कौतुक म्हणजे सुख.. लेकीने प्रेमाने बनवून दिलेलं साद्या कागदावरच छोटंसं ड्रॉइंग ग्रीटिंग म्हणजे सुख.. मान्सून च्या पहिल्या पावसात चिंब भिजता येणं म्हणजे सुख.. एखादं बीज अंकुरताना त्याला रोज वाढताना पाहणं म्हणजे सुख.. रखरखत्या प्रवासात थंडगार चिंब हिरवी, नजर जाईल तिथ पर्यंत भाताची डोलणारी शेत अचानक दृष्टीस पडावी हे म्हणजे सुख…एखाद्या टपरीवरचा चहा पिताना आपल्या मैत्रिणीची आलेली गोड आठवण म्हणजे सुख..काही वेळा नुसतच बसून जुन्या गोड रम्य आठवणीत रमता येणं म्हणजे सुख..चांदण्या रात्री दूर समुद्र किनारी अनवाणी पायांनी त्या मऊशार वाळूवर सख्याच्या हातात हात घालून नुसत फिरत राहणं म्हणजे सुख.. तुफान कोसळत्या पाऊसधारा हातात चहा चा कप घेऊन खिडकीत बसून पाहत राहणं म्हणजे सुख.. एखादं सुंदर पुस्तक वाचताना स्थळ काळाच भान विसरून जाणं म्हणजे सुख…एखाद्या विशाल धबधब्या कडे पाहत राहण, त्याचे तुषार अंगावर झेलणं म्हणजे सुख… खरं सांगू का मैत्रिणींनो ह्या विषयावर मी इतकं लिहू शकते की एक पुस्तकं होईल.. पण खरचं मानलं तर दगडात ही देव दिसतो नाहीतर काहीच नाही.. तसचं सुखाच आहे.. सुख आपल्या मनात असतं.. कुठल्या गोष्टी, कुठली परिस्थिती त्याच्यात बदल घडवू शकते असं मला तर नाही वाटतं..सुखाची कल्पना प्रत्येकाची भिन्न असली तरी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखाचे दिवस येतातच.. तो भरभरून देत असतो प्रत्येकाला.. अर्थातच ते ओळखता आलं पाहिजे.. सुख हे मानण्यावर आहे.. तसचं सुख हे मान्य करण्यावर ही आहे.. माझ्यासाठी तर मन उल्हसित करणारा प्रत्येक क्षण म्हणजे सुख आहे.. आणि असे सुखद क्षण माझ्या आयुष्यात रोज नव्या रुपात माझ्या आयुष्यात येतात आणि हो मला ते कळतात हे माझं भाग्य आहे…

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वृद्धपण आणि मौन… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

?  विविधा ?

☆ वृद्धपण आणि मौन… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

वृद्धपण आणि मौनः

मौन” हा शब्द ऐकल्याक्षणी कुसुमाग्रजांची कविता आठवली.

शिणलेल्या झाडापाशी

कोकिळा आली

म्हणाली, गाणे गाऊ का ?

झाड बोललं नाही

कोकिळा उडून गेली.

 

शिणलेल्या झाडापाशी

सुग्रण आली

म्हणाली घरटे बांधु का?

झाड बोललं नाही

सुग्रण निघून गेली.

 

शिणलेल्या झाडापाशी

चंद्रकोर आली

म्हणाली जाळीत लपू का?

झाड बोललं नाही.

चंद्रकोर मार्गस्थ झाली.

 

बिजली आली

म्हणाली मिठीत येवू का?

झाडाचे मौन सुटलं

अंगांअंगातून

होकारांचे तुफान उठलं.

.

.

.

.

 

पहिल्यांदा वाचली तेव्हा नव्हती समजली. परत वाचली….

परत परत वाचली…

आणि लक्षात आले की हे तर शिणलेल्या झाडाचे समजूतदार मौन आहे….

अनेक वर्ष कोकिळा येवून  गात असेल, बर्‍याच सुगरण पक्षांनी पिल्लांसाठी सुंदर घरटी विणली असतील, चंद्रकोर तर कितीतरी वेळा झाडाच्या जाळीत लपली असेल….

असे सगळ्यांच्या सोबतीत ऐश्वर्यसंपन्न आयुष्य घालवलेल्या झाडासाठी आता आपण थकलो आहोत…

शिणलो आहोत हे स्विकारणे किती कठिण झाले असेल…

 

पक्षांच्याही लक्षात आले आहे की झाड दमलेय….

म्हणून तर विचारताहेत….

की शिणलेल्या झाडाला एकटे वाटू नये म्हणून येताहेत…

 

“नाही” पण म्हणता येत नाही आणि “हो” पण…

 

अश्या वेळी मौनाची सोबत असते….

थोडीशी घुसमट…

पण शब्दाशिवाय पोहोचते बरेच काही….

अशी ही मौनाची भाषा…

आणि कवितेचा शेवट तर….

 

समर्पणाचा…

मनाला चटका लावणारा…..

 

यानिमित्ताने आठवत राहिले ते स्वतःहून स्विकारलेलेले मौन….

 

पटत नसले तरी त्या क्षणी वाद वाढू नये म्हणून,

खूप आनंदाच्या वेळी शब्दातून व्यक्त होता येत नाही तेव्हा,

जंगलातील नीरव शांततेत,

कधीतरी स्वतः लाच चाचपडत असतांना….

 

माणसामाणसातील नात्यांमध्ये तर

कधीतरी  समोरच्याला समजून घेतांना

एकाने थांबणे पण गरजेचे….

.

.

.

.

 

यानिमित्ताने एक प्रसंग आठवला. तरुण मंडळींनी गावातल्या एका आजीबाईंना विचारले की

 

 इतकी वर्ष तुम्ही आनंदाने कसा संसार केला?

त्या म्हणाल्या “तो आग झाला की मी पाणी व्हते…”

 

गम्मत म्हणजे एका तरुण मित्राने लगेच प्रतिसाद दिला आणि म्हणाला

 “म्हणून तर ती राजाची राणी होते “

 

……असे पाणी होतांना मौनाची सोबत नक्की होत असेल का? 

खरं तर मला असे वाटते की ठरवून धारण केलेल्या मौनाची ताकद असतेच असते पण कधी व्यक्त व्हायचे आणि कधी मौनात रहायचे हे  समजले की आयुष्य मात्र नक्की सोपे, सहज होते.

लेखक : अज्ञात 

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सार्वजनिक संस्थेचा गाभा…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “सार्वजनिक संस्थेचा गाभा…–☆ श्री जगदीश काबरे ☆

लोकांपासून कसलेही काम घ्यावयाचे असेल, तर सोशिकपणा धारण केला पाहिजे, हा आपल्या विचाराचा गाभा असला पाहिजे तरच आपण समाजसुधारणेच्या कामात तग धरू शकू. सुधारणेची गरज वाटते ती सुधारकाला. तो ज्या लोकांना सुधारण्याची अपेक्षा करतो, त्यांच्याकडून त्याने विरोधाची, तिरस्काराची, किंबहुना जीवावरील संकटाचीही अपेक्षा ठेवली पाहिजे. कारण सुधारक जिला सुधारणा म्हणतो, ती कुधारणाच आहे, असे स्थितिशील समाजाला वाटत असते. अशा वेळेस सार्वजनिक संस्था उभारणे आणि शस्त्रकाट्याच्या कसोटीवर टिकवून ठेवणे ही एक कसरतच असते.

अनेक सार्वजनिक संस्था सुरू करून, त्यांची व्यवस्था चालविण्याच्या जबाबदारीचा अनुभव घेतल्यानंतरच मी अशा दृढ निर्णयावर आलो की, कोणत्याही जाहीर संस्थेने कायम फंडावर गुजारा करण्याचा प्रयत्न करू नये. तसे करण्यामध्ये तिच्या नैतिक अधोगतीचे बीज साठविलेले आहे. सार्वजनिक संस्था म्हणजे लोकांची मान्यता आणि लोकांचे पैसे यांवर चालणारी संस्था. अशा संस्थेला लोकांची मदत मिळेनाशी होईल, तेव्हा तिला अस्तित्वात राहण्याचा हक्कच राहत नाही. कायम फंडावर चालणाऱ्या संस्था लोकमताविषयी बेपर्वा होताना आढळतात; कित्येक वेळा तर धडधडीत लोकमतांविरुद्ध आचरण करताना दृष्टीस पडतात. अशा तऱ्हेचे अनुभव देशात आपल्याला पावलोपावली येतात. धार्मिक म्हटल्या जाणाऱ्या कित्येक संस्थांच्या हिशेबठिशेबांचा ठावठिकाणा नाही. त्यांचे संस्थापक, त्यांचे मालक होऊन बसले आहेत आणि त्यांच्यावर कोणाचा ताबा चालत नाही.

सृष्टी ज्याप्रमाणे रोजचे अन्न रोज तयार करून रोज खाते, त्याप्रमाणे सार्वजनिक संस्थांचे असले पाहिजे, याबद्दल मात्र मला तिळमात्र शंका नाही. ज्या संस्थेला लोक मदत करण्यास तयार नाहीत, त्या संस्थेला सार्वजनिक संस्था म्हणून जगण्याचा अधिकारच नाही. प्रतिवर्षी मिळणारा फंड, ही त्या त्या संस्थेच्या लोकप्रियतेची व तिच्या चालकांच्या प्रामाणिकपणाची कसोटी आहे आणि प्रत्येक संस्थेने या कसोटीला उतरलेच पाहिजे, तरच ती संस्था लोकांच्या विश्वासास पात्र ठरेल.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ३५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- आम्ही बाबांजवळ पोचण्यापूर्वीच बाबांनी अखेरचा श्वास घेतला होता… ! आम्ही त्यांच्यापासून एका श्वासाच्या अंतरावरच उभे तरीही त्यांच्यापासून लाखो योजने दूरसुद्धा… !!

बाबांचं असं अनपेक्षित जाणं पुढे येणाऱ्या अतर्क्य अनुभवांना निमित्त ठरणार होतं! )

 बाबांचं असं अनपेक्षित जाणं माझं भावविश्व उध्वस्त करून गेलं होतं. मी अगदी हताश, हतबल होऊन त्यांचे दिवस होईपर्यंत आई व भावंडांबरोबर असूनही स्वतःच्याच दुःखात रुतून बसलो होतो. माझ्याही नकळत्या वयापासून वर्षानुवर्षे साठत गेलेल्या बाबांच्या कितीतरी आठवणी मनात गर्दी करीत रहायच्या ! त्या आठवणींमधेच मी गुंतून पडायचो. गप्पगप्प रहायचो.

 बाबांच्या व्यक्तिमत्त्वातल्या अगदी साध्या साध्या गोष्टी पण ते गेल्यावर मात्र त्यांचं महत्त्व आणि मोल आत्ता खऱ्या अर्थानं जाणवतंय असंच वाटत रहायचं. त्या आठवणींमधली बाबांची कितीतरी रूपं! सगळीच आज हरवून गेलेली तरीही हवीहवीशी!! प्रतिकूल परिस्थितीतही कधी हतबल न होणारे, दत्त महाराजांवर अतिशय निखळ, दृढ श्रद्धा असणारे आणि अखेरच्या श्वासापर्यंत ती जपणारे, आर्थिक ओढग्रस्तीतही समाधानाने रहाणारे, जांभळाच्या झाडाचं लाकूड ठिसूळ असतं, आम्ही पडून इजा करुन घेऊ नये म्हणून काळजीपोटी आम्हाला कधीच दारातल्या जांभळाच्या झाडावर चढू न देता स्वतःचा जीव धोक्यात घालून, आमच्यासाठी रोज स्वत: झाडावर चढून आम्हाला ताजी टपोरी जांभळं काढून देणारे, आर्थिक ओढग्रस्तीमुळे आमचे अगदी साधे बालहट्टही बऱ्याचदा पुरे करता यायचे नाहीत तेव्हा त्यांच्या नजरेत भरून राहिलेली दुखरी खंत केविलवाणं हसत लपवायचा प्रयत्न करणारे… अशी बाबांची कितीतरी रूपं!

 बाबा कधीच आमच्यावर हात उगारणं सोडाच आम्हाला रागवायचेही नाहीत. कधीतरी अतीच झालं तर चिडून आईच आम्हाला धपाटा घालायला यायची तेव्हाही, ” मारु नकोस गं.. लहान आहेत ती.. ” म्हणत आमची सुटका करायचे.. !

 आम्हा सर्वच भावंडांवर त्यांचं प्रेम, माया होतीच पण त्याबाबतीत त्यांच्याकडून प्रत्येक वेळी झुकतं माप मिळत गेलं होतं ते मलाच. माझं काही खास कर्तृत्त्व होतं असं नाही, पण लहान वयात दोन इयत्ता एकदम करून मी माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या असणाऱ्या माझ्या भावाबरोबर तिसरीत शाळेत जाऊ लागलो याचंच त्यांना अप्रूप वाटायचं. माझ्यापेक्षा तो अभ्यासात कितीतरी पटीने हुशार. त्यामुळेच परीक्षेत माझ्यापेक्षा कितीतरी जास्त मार्क मिळवून तो नेहमी नंबरात असायचा. त्याला शाबासकी मिळायची पण जवळ घेऊन कौतुक मात्र माझंच व्हायचं. बाबा गेल्यानंतर हे सगळं आठवायचं तेव्हा मात्र एक वेगळीच रुखरुख मन कुरतडू लागायची. बाबांकडून लहानपणापासून असं उदंड प्रेम, माया मिळवूनही त्यांची सेवा करणं मात्र माझ्या नशिबात नव्हतं. बाबांचं आजारपण सुरू झाल्यापासून मी नोकरी निमित्ताने कायम त्यांच्यापासून दूर तिकडे मुंबईत. आई आणि माझे दोन्ही भाऊ यांनी बाबांच्या संपूर्ण आजारपणात त्यांची अतिशय प्रेमाने, मनापासून सेवा केली पण मला मात्र ते समाधान मिळालं नाही याचं दुःख मनात घर करुन राहिलेलं! बाबांचे दिवस होईपर्यंतच्या प्रत्येक क्षणी मला ते त्रास देत राहिलं होतंच आणि पुढंही दीर्घकाळ मनात रुतून बसलं होतं. त्या विचारात लपलेली माझ्या मनातली अस्वस्थता बाबांच्या पर्यंत मी न सांगता अलगद जाऊन पोचलेली होती याचा प्रत्यय देणाऱ्या घटना पुढे माझ्या आयुष्यात जेव्हा घडल्या तेव्हा मृत्यू आणि पुनर्जन्मामागच्या गूढ रहस्याची दारं थोडीतरी किलकिली झाली पण ते सगळं मधे बरीच वर्षे उलटून गेल्यानंतर! पण त्याही आधी बाबा गेल्याच्या आम्हा सर्वांच्याच मनातल्या दुःखावर हळुवार फुंकर घालून ते दु:ख हलकं करु पहाणारी एक घटना माझ्या मोठ्या भावाच्या संदर्भात घडली तीही आश्चर्याने थक्क व्हावं अशीच होती. आमचं समाधान करता करता बरंच कांही हातचं राखून ठेवणारी आणि म्हणूनच अनाकलनीय वाटावी अशीच ती घटना होती!

 ती घटना अतुलच्या, माझ्या पुतण्याच्या तान्हेपणीची. बाबा सप्टेंबर १९७३ मधे गेले. त्यानंतर वर्षाच्या आत भावाचं लग्न करायला हवं म्हणून आमच्या जवळच्या नातेवाईकांनी त्याच्यासाठी वधुसंशोधन सुरु केलेलं. योगच असे जुळून आले की बाबा जाऊन वर्ष व्हायच्या आत मे १९७४ मधे भावाचं लग्नही झालं. अतुलचा म्हणजे माझ्या पुतण्याचा जन्म १९७५ मधला. जन्मतः तो अतिशय चांगला, तब्येतीने छान, सुदृढ होता. काळजी वाटावी असं कांही नव्हतंच. पण बाळंतपणानंतर तो तीन महिन्याचा झाल्यावर वहिनी त्याला घेऊन इस्लामपूरला परत आल्या आणि अचानक कधी कल्पनाही केली नव्हती असं विपरीत घडलं. तोवर एरवी अगदी शांत, लाघवी असणारं बाळ दिवसभर अगदी आनंदी, खेळकर असायचं पण तिन्हीसांजेला मात्र कर्कश्श रडू लागायचं. कितीही थोपटलं, जोजवलं, शांत करायचा प्रयत्न केला तरी त्याचं रडणं थांबायचंच नाही. खूप रडून थकल्यानंतर भुकेल्या अवस्थेतच मलूल होऊन झोपून जायचं. दुसऱ्या दिवशीही असंच घडलं. वरवर लक्षात येईल अशी कांहीच लक्षणं जाणवली नाहीत आणि आजीच्या बटव्यातल्या औषधाचाही काही उपयोग झाला नाही तेव्हा मात्र तातडीने त्याला ओळखीच्या डॉक्टरांकडे नेलं. त्यांनी बाळाला तपासलं. सगळंच तर व्यवस्थित होतं. ‘एकदम वातावरण बदलल्यामुळं रडत असेल. काळजी करण्यासारखं कांहीही कारण नाही’ एवढा दिलासा डॉक्टरांनी दिला तेव्हा मनातली भीती काही अंशी कमी झाली खरी पण तिसऱ्या दिवशी संध्याकाळीही अंधार पडू लागताच बाळ रडू लागलं तसा मात्र सगळ्यांचाच जीव टांगणीला लागला. तो गुरुवार होता. आई देवापुढे दिवा लावत होती. तिने घाईघाईने दिवा लावून देवाला मनोभावे नमस्कार केला. तिच्या काय मनात आलं कुणास ठाऊक. ती जागची उठली. बाहेर येऊन तिने वहिनींकडून बाळाला घेतलं. मांडीवर घेऊन त्याला थोपटत शांत करायचा प्रयत्न करत असतानाच तिने भावाला जवळ बोलावलं. म्हणाली, “हे बघ, मी देवापुढं दिवा लावून आलीय. आज गुरुवार आहे. तू आत जाऊन देवाला हात जोडून प्रार्थना कर, डबीतला चिमूटभर अंगारा हातात घे आणि यांचं स्मरण करुन त्यांना सांग, म्हणावं, ‘आम्ही तुम्हाला विसरलेलो नाही आहोत. आणि कधी विसरणारही नाही. ‘ आणि बाळाला तो अंगारा लाव. यापेक्षा आत्ता याक्षणी बाकी आपल्या हातात कांहीही नाहीय. “

 बाळाचं रडणं सुरूच होतं. भाऊ लगोलग जागचा उठला. आत गेला. देवाला प्रार्थना करून, बाबांचं स्मरण करून, त्यांने बाळाला अंगारा लावला आणि क्षणार्धात हळुहळू शांत होत बाळाचं रडणं कमी होत गेलं. हात-पाय हलवत इकडं तिकडं पहात बाळ आपली

बाळमूठ चोखत अलगद डोळे मिटत झोपून गेलं!

 घडल्या गोष्टीचं आश्चर्य करीत सर्वांनी त्या रात्री अंथरुणाला पाठ टेकली खरी पण त्या आश्चर्याइतकंच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काय घडतंय त्याचं नाही म्ह़टलं तरी थोडं दडपण प्रत्येकाच्या मनावर होतंच.

 दुसऱ्या दिवशी तिन्हीसांजेला जेव्हा न रडता बाळ छान खेळत राहिलं, तेव्हा मात्र सगळ्यांच्या डोक्यावरचं ओझं आपसूकच हलकं झालं होतं!

 या अनपेक्षित अशा अघटीत घटनेमुळे अतुल बाळाच्या रूपानं बाबाच या घरी परत आलेत अशीच भावना सगळ्यांच्याच मनात निर्माण झाली आणि ते सहाजिकही होतंच!

 हे सगळं पुढं कधीतरी गप्पांच्या ओघात मला प्रथम समजलं तेव्हा मनातल्या दृढ श्रद्धेमुळेच असेल पण त्याबद्दल कणभरही साशंकता माझ्याही मनात निर्माण झालेली नव्हती एवढं खरं. पण त्यावेळी मला न वाटलेली साशंकता माझ्या मनात नंतर डोकावून गेली ती या घटनेला परस्पर छेद देणारी, कधीच विसरता न येणारी, सर्वांच्याच मनाला चटका लावून जाणारी एक अनपेक्षित घटना पुढे माझ्याही संसारात घडली तेव्हा! मनात डोकावून गेलेल्या त्या साशंकतेत मृत्यू आणि पुनर्जन्म याबाबतचं अनामिक असं कुतूहलही नकळत मिसळून गेलेलं होतं आणि तेच पुढं अनेक दिवस मला बेचैनही करीत राहिलं होतं!!

 क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आपणही होऊ या अर्जुन… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ गीता जयंती विशेष  – आपणही होऊ या अर्जुन… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

जगाच्या इतिहासात अशी एकमेव घटना असावी की ऐन युद्धाच्या धामधुमीत एका पथभ्रष्ट होऊ पाहणाऱ्या महापराक्रमी योध्यास त्याचा सारथी काही युक्तीच्या चार गोष्टी सांगतो. महापराक्रमी असणारा हा वीर पुरुष आपल्याशी लढायला सज्ज असलेल्या आपल्याच नातेवाईकांना पाहून युद्धातून पळ काढण्याची अनेक कारणे त्या सारथ्यास सांगतो. सारथी ती सर्व कारणे (?) शांत चित्ताने ऐकून घेतो. आणि त्यानंतर सलग अठरा अध्यायांचे कर्मशास्त्र त्यास सांगून त्या महापराक्रमी योध्यास युद्धास प्रवृत्त करतो. बरं ही कहाणी इथेच समाप्त होत नाही तर एका अर्थाने या कहाणीची ही सुरुवात (प्रारंभ) ठरते. कारण इतक्या सुस्पष्ट आणि चपखल शब्दात या आधी ‘कर्मशास्त्र’ कोणी कथन केलेले नव्हते.  आणि केले असले तरी ते सामान्य जनांच्या कानी पडले नव्हते असेच म्हणावे लागेल.

श्रीमद्भगवद्गीता सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रावर सांगितली गेली आहे. ऐकणारा अर्जुन होता आणि सांगणारा साक्षात् भगवान कृष्ण होते. अर्जुन कोण होता तर पाच पांडवांपैकी एक. श्रीकृष्णाचा परमभक्त अर्जुन. प्रश्न असा पडतो की अर्जुनासारख्या नित्य नामस्मरणात असणाऱ्या थोर भक्ताला सुद्धा विषाद व्हावा, त्याचे मन अस्थिर व्हावे, हे विशेष नव्हे काय ? अर्जुनाची जर अशी स्थिती असेल तर सामान्य माणसाने काय करावे ? आजच्या एकूणच धकाधकीच्या जीवनात कसे आनंदी राहायचे हाच मोठा प्रश्न होऊन बसल्याचे आपल्या लक्षात येईल. अर्जुनाला किमान इतकी तरी खात्री होती, इतका तरी विश्वास होता की ‘भगवंत’ त्याच्या बरोबर आहेत, त्याच्या पाठीशी आहेत. आज सामान्य मनुष्याला त्याच्या बरोबर नक्की कोण आहे? याची शाश्वती नाही. तसेच बरोबर असणारे किती साथ देतील याची खात्री नाही. कारण त्याचा स्वतःवर जितका असायला हवा तितका विश्वासच नाही; तर दुसऱ्यावर कसा विश्वास असणार ?  बरं, भगवंताला एखाद्याची दया आली आणि सहाय्य करण्यासाठी ते प्रगट झाले तरी या मनुष्याच्या मनातील शंका-कुशंका भगवंताला त्यास सहाय्य करण्यापासून नक्की रोखतील, अशी स्थिती आहे. आजच्या ‘अर्जुना’चे इतके ‘स्खलन’ झाले आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये.

गीता ही ‘धर्मक्षेत्र’ असलेल्या ‘कुरुक्षेत्रा’वर सांगितली गेली आहे. त्यामुळे भगवंतांना प्रगट होण्याइतके तरी ‘धर्मक्षेत्रे’ टिकविण्याची नितांत गरज असल्याचे आपल्या लक्षात येईल. सध्याचे ‘कुरुक्षेत्र’ हे ‘धर्मक्षेत्रां’वर आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कारण सामान्य मनुष्य स्वधर्मपालन करताना दिसतोच असे नाही किंवा स्वधर्म म्हणजे नक्की काय असते हे सांगण्याची, शिकविण्याची व्यवस्था आज आपण निर्माण केली नाही किंवा करू शकलेलो नाही. सध्या मनुष्य फक्त ‘धावतोय’. सकाळी उठून नोकरीवर जाण्यासाठी आणि नंतर नोकरीवरून घरी पोचण्यासाठी. कधी सुखाच्या मागे तर कधी दुःखापासून दूर जाण्यासाठी. यातच त्याची अर्धीअधिक ऊर्जा आणि वेळ खर्च होत आहे. आपण नक्की काय करतोय ? जगतोय की मरत नाही म्हणून जगतोय हेच त्याच्या लक्षात येत नाही.

मनुष्याला आपली सद्यस्थिती कळली तर तो त्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करू शकेल; पण सध्या मनुष्य शाळेत करायचा तसा ‘कदमताल’ करीत आहे आणि आपण फार मोठी उन्नती केली अशा भ्रामक समजुतीत सुख मानीत आहे. आपण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे युद्धभूमीवर लाखो लोक असतील पण विषाद (संभ्रम) मात्र अर्जुनालाच झाला. कारण इथे अर्जुन सामान्य मनुष्याचे प्रतिनिधित्व करीत आहे. जे मोठे (इथे कोणीही मनात जात आणू नये ) वर्गातील असतात त्यांना प्रश्न पडत नाहीत किंवा ते आपापल्या परीने त्या प्रश्नांची उत्तरे शोधतात. तिसरा वर्ग लहान लोकांचा असतो त्यांना रोजच्या जेवणाची भ्रांत असते, ते मिळविण्यातच त्यांचा वेळ जातो. प्रश्न फक्त दुसऱ्या वर्गातील अर्थात मध्यम प्रवृत्तीच्या माणसांना पडतात. आजपर्यंत जितक्या म्हणून ‘चळवळी’ झाल्या, आंदोलने त्यात सामान्य मनुष्य आघाडीवर असल्याचे आपल्या लक्षात येईल. भारतीय स्वातंत्र्ययुध्दात भाग घेतलेली बहुतांश मंडळी मध्यमवर्गीयच होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे ‘सामान्य’च होते. रामाने सुद्धा (वा)नरांच्या मदतीने रावणाचा पराभव केलेला आहे. या सर्व गोष्टी म्हणजे आपला विजयी आणि स्फूर्तिदायक इतिहास आहे.

भगवद्गीता हे ‘पुस्तक’ नाही. प्रत्यक्ष भगवंतांच्या मुखातून ताण-तणावाच्या परिस्थितीला सकारात्मक, ‘स्वधर्मा’ची कृती जोडून तोंड देण्यासाठी केलेले ते उत्कृष्ट मार्गदर्शन आहे. आयुष्यात अनेक समर प्रसंगांना तोंड देताना सर्वसामान्य माणूस अर्जुनाप्रमाणे गलितगात्र होऊन जातो. नैराश्य दाटून येते. कुठे तरी पळून जावेसे वाटते. मनुष्याला नित्यकर्म करावीशी वाटत नाहीत. हे करू की ते करू ? मीच का करायचे ? देव फक्त मलाच दुःख देतो ? माझेच वाईट होते अथवा केले जाते ? असे अनेक प्रश्न मनुष्यास पडत असतात. मग, मनुष्य थातुरमातुर कारणे देऊन निज कर्तव्यापासून स्वतःला दूर न्यायला लागतो. हाच ‘विषाद’.

‘विषाद’ कधी भोगात आणि कधी रोगात परिवर्तीत होत असतो. विषाद ‘योगात’ परावर्तित झाला तर गीतेचे ज्ञान प्राप्त होऊन मनुष्यास विश्वरूप दर्शन होऊ शकते.  पण तो जर भोगात किंवा रोगात परावर्तित झाला तर मात्र मनुष्याचे मोठे नुकसान होते. 

त्या अर्जुनाला स्वत:च्या मर्यादांची जाणीव होती आणि कृष्णावर विश्वासही होता. अहंकार बाजूला ठेवून कृष्ण काय सांगतो आहे ते ऐकून घेण्याची, शरण जाण्याची त्याची मनापासून तयारी होती. म्हणूनच त्याच्या विषादाचे परिवर्तन ‘योगा’त होऊन जीवनाचे चिरंतन, शाश्वत तत्त्वज्ञान जन्मास आले. आपल्या विवंचना, चिंता आणि अन्य सर्व समस्यांकडे आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून बघता आले पाहिजे. हाच दृष्टिकोन श्रीमद्भगवद्गीता आपल्याला शिकविते. त्यासाठी मात्र अर्जुन होण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे, तसा प्रयत्न करायला पाहिजे, किमान प्रारंभ !!!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गीतेतील मोक्ष कल्पना… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

🌸  विविधा  🌸

गीतेतील मोक्ष कल्पना☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

गीता जयंतीच्या निमित्ताने थोडेसे चिंतन…

रंगबिरंगी नवरसांनी भरलेल्या जीवनात सुख आणि दुःखाचे अनेक प्रसंग येतात. ते चाकाच्या आऱ्या प्रमाणे निरंतर खाली वर फिरत असतात. कधी कधी तर काय करणे श्रेयस्कर होईल हे ठरवणे अवघड असते. अशा वेळी मार्गदर्शक ठरणारा उत्कृष्ट ग्रंथ म्हणजे गीता. गीतेचे महत्त्व सांगणारा एक सुंदर श्लोक आठवतो….

“सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन:|

पार्थो वत्स:सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतम् महत्||”

अशी ही गीता केवळ मृत्यू नंतरच्याच मोक्षाचा मार्ग दाखविते असे नाही तर जगताना येणाऱ्या प्रश्नांमधून मिळणाऱ्या मोक्षाचा मार्गही दाखविते. अर्जुनाला कृष्णाने दाखविला त्याप्रमाणे.

मोक्ष म्हणजे मुक्ती. आपल्या धर्मात पुनर्जन्माचा सिद्धांत मांडला आहे. म्हणजे पूर्वीच्या जन्माच्या कर्मानुसार या जन्मात फळ मिळते व पुन्हा पुन्हा जन्मही मिळत राहतो. या कर्मबंधनातून सुटका पाहिजे असल्यास या जन्मात कर्माचे बंधन लागणार नाही असे कर्म करायला हवे. ते कसे असावे? याचा मार्ग गीतेत सांगितला आहे.

गीतेवर अनेक टीकाकारांनी निरनिराळा अर्थ लावून टीका सांगितली आहे. त्यात प्रामुख्याने शंकराचार्यांनी लिहिलेल्या गीता टिकेत गीतेत प्रामुख्याने ज्ञानयोग सांगितला आहे असे मत मांडले आहे. म्हणजेच आत्म्याच्या स्वरूपाचे ज्ञान म्हणजेच पिंडी तेच ब्रम्हांडी असल्याचे ज्ञान झाले की मग कर्म संन्यास घेतला की मगच मोक्ष मिळतो. म्हणजेच आत्मा परमात्म्यात विलीन होऊन मोक्ष मिळतो म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते असे मत मांडले आहे.

तर भक्ती मार्ग हेच भगवंतापर्यंत जाण्याचे अत्यंत सुलभ साधन आहे म्हणून गीतेतील मुख्य प्रतिपाद्य विषय भक्तीयोग हा आहे हे सांगणारा आहे एक पंथ आहे. हा भक्तिमार्ग अतिशय उत्कृष्ट आणि रसाळ वाणी व सुंदर दृष्टांतांनी फुलवून सांगणारा उत्कृष्ट ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी.

त्याचप्रमाणे लोकमान्य टिळकांनी या दोन्ही ग्रंथांचा आधार घेऊनच पुढची वाट चोखाळली आहे. त्यांच्या मते युद्धभूमीवर अर्जुनाने शस्त्र खाली ठेवल्यानंतर त्याला केवळ युद्धासाठी प्रवृत्त करण्यासाठीच भगवान कृष्णांनी गीता सांगितली आहे. त्याअर्थी गीतेचा प्रतिपाद्य विषय कर्मयोग हाच आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या ग्रंथाला कर्मयोगशास्त्र अथवा गीता रहस्य असे नाव दिले आहे.

प्रत्येकाने आपापल्या काळात समाजाची गरज ओळखून व जे ठासून सांगण्याची गरज आहे ते ओळखून गीतेचा मुख्य प्रतिपाद्य विषय कोणता आहे ते मांडले आहे असे मला वाटते.

शंकराचार्यांना त्यांच्या काळात समाजाला ज्ञानयोग सांगण्याची म्हणजेच ब्रह्मसत्य जगत् मिथ्या हे सांगण्याची मुख्यत्वे करून गरज वाटली. म्हणून त्यांनी समाजमान्य असलेल्या गीता या ग्रंथाचा आधार घेऊनच ज्ञानयोग सांगितला.

 ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात कर्मकांडाचे अतिशय स्तोम माजले होते व त्यापायी समाजातील माणुसकीच नष्ट झाली आहे हे त्यांच्या लक्षात आले. व

“अद्वेष्टा सर्व भुतानाम् मैत्र: करुण एव च |

 निर्ममो निरहंकार: समदुःखसुख:क्षमी||”

याप्रमाणे कोणाचा द्वेष न करणारा व सर्व प्राणिमात्रांशी मित्र भावाने वागणारा असा भक्तच भगवंताला प्रिय असतो हा उपदेश करणे त्यांना आवश्यक वाटले. म्हणून त्यांनी गीतेवर प्रवचन करताना भक्तियोगाचे महत्त्व जनसमुदायाला पटवून सांगितले.

लोकमान्य टिळकांना वाटत होते की आपण पूर्वी मोगलाईत अत्याचार सहन केले. आता ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आहोत व इकडे लोकांची प्रवृत्ती तर ईश्वराची इच्छा होईल तसे घडेल अशी आहे. अशा वेळी त्यांचा जो गीतेचा सखोल अभ्यास होता त्यावरून त्यांनी प्रकर्षाने मांडले की गीता अर्जुनाला शस्त्र हाती घेण्यासाठीच सांगितली आहे. तेव्हा गीतेत प्रामुख्याने कर्मयोग सांगितला आहे. त्या काळात, स्वातंत्र्यासाठी लढा देण्याचीच आवश्यकता आहे आणि आपल्या मुख्य धर्मग्रंथातही तेच सांगितले आहे असे मत मांडले.

आपल्या तत्त्वज्ञानात मोक्षप्राप्तीसाठी निवृत्ती मार्ग व प्रवृत्ती मार्ग चोखाळावे असे निरनिराळ्या तत्त्वज्ञांनी मांडलेल्या मतातून दिसून येते.

निवृत्ती मार्ग म्हणजे संसाराचा त्याग करून संन्यास घ्यायचा व कर्म संन्यासच घेऊन तपश्चर्येला बसावयाचे. कर्म जळून खाक होतील तेव्हाच मोक्ष प्राप्त होईल हे मत. पण एक असाही मतप्रवाह आहे की पूर्ण कर्मे कोणाला सुटूच शकत नाहीत. जीव जगवायला खावे लागणार. खाणे मिळण्यासाठी कमीत कमी का होईना परंतु कर्मे करणे आवश्यकच आहेत. संन्याशाची पण एक कुटी असतेच.

प्रवृत्ती पर मार्ग म्हणजे कर्म करावयाची पण निष्काम भावनेने करायचे. भगवंतांनी गीतेत म्हटलेच आहे…

“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन|

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोsस्त्व कर्मणि”

भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की केवळ कर्म करण्यावरच तुझा अधिकार आहे. फळ मिळणे तुझ्या अधिकारातच नाही. म्हणून तू फलाशा मनात धरून कर्म करूच नकोस. फलाशा न धरता कर्म केले तर कर्माचे बंधन न लागता मोक्ष मिळतो.

ज्याप्रमाणे कर्म करण्यापासून मनुष्य मुक्त होऊ शकत नाही त्याचप्रमाणे सामान्य माणूस फलाशेपासून तरी मुक्त होऊ शकतो का? आपल्या मनात अनेक गोष्टींची तीव्र इच्छा असते. ती मनात धरूनच आपण आपल्या कामांची आखणी करतो. संपूर्णपणे वैराग्य आपल्यासारख्या सामान्यांना येऊच शकत नाही.

निष्काम कर्माचे महत्त्व सांगताना आचार्य विनोबांनी गीता प्रवचने मध्ये खूप सुंदर उदाहरण दिले आहे. ते म्हणतात की लहान मूल खेळण्याची क्रिया करते त्यातून त्याला फक्त आनंद मिळतो. कुठलाही हेतू मनात ठेवून तो खेळत नाही. पण खेळण्याच्या व्यायामातून प्रकृती चांगली राहणे हे फळ त्याला आपोआप मिळते. त्याप्रमाणेच बालकाचे निरागस मन घेऊन आपण कर्म केले तर त्याचे चांगले फळ फलाशा मनात न धरता ही आपल्याला मिळतेच.

असेच आणखी एक उदाहरण! एक मानसशास्त्रज्ञ अभ्यासाच्या एकाग्रतेसाठी समुपदेशन करताना विद्यार्थ्यांना ‘कर्मण्येवाधिकारस्ते’ हाच श्लोक सांगायचे. आणि म्हणायचे की अभ्यासानंतरच्या निकालात अमुक मार्क्स मिळतील याचाच विचार करशील तर निकालाच्या विचारांवरच तुझे मन केंद्रित होईल व अभ्यासावरून मात्र उडेल म्हणून तू चांगला अभ्यास कसा करायचा याचाच फक्त विचार कर. निष्काम कर्मयोगाचे महत्त्व या उदाहरणावरून लक्षात येते. रोजच्या जीवनात कर्मबंधनाची मुक्तता हीच नाही का?

आता इथे प्रश्न निर्माण होतो की कृष्णाला फक्त अर्जुनाला युद्ध करताच प्रवृत्त करायचे होते तर “अर्जुना फालतूपणा करू नकोस चल उठ धनुष्य हातात घे” एवढे जरी कृष्णांनी म्हटले असते तरी अर्जुनाने शस्त्र हातात घेतले असते. पण तो अर्जुन होता. श्रीकृष्णाची आज्ञा त्याने पाळली असती तरी मनापासून लढला नसता. कारण आपल्याच आप्तांना व वडीलधाऱ्यांना कसे मारू? ही शंका त्याच्या मनात होतीच. त्यासाठी भगवंतांना ज्ञान- भक्ती- कर्म ;या सर्वांचीच चर्चा करणे आवश्यक वाटले. अर्जुन एक एक शंका विचारत गेला. त्याचे निरसन करता करता प्रत्यक्ष भगवंताने ‘परिजनाला मारलेस तरी तू कर्तव्य कर्मच करतो आहेस म्हणून तू मोक्षालाच जाशील’ असे अर्जुनाला सांगितले.

सर्वप्रथमच आप्तांना समोर बघून यांना मारून स्वर्गाचे राज्य हे मला नको असे अर्जुन सांगतो. त्यावेळी आत्मा अमर असून तो फक्त हे शरीर मारणार आहेस. आत्मा कशानेही मारल्या जाऊ शकत नाही. हे कृष्णाने सांगितले व जन्म घेणाऱ्याला मृत्यू व मृत्यूनंतर पुन्हा जन्म निश्चित आहे. म्हणून तू त्याचा शोक करू नकोस. असे सांगितले आहे.

तरीदेखील अर्जुन तयार होत नाही त्यावेळी भगवान सांगतात;

“यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारत |

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्||”

या श्लोकातून भगवान सांगतात की जेव्हा जेव्हा अनाचार माजतो तेव्हा तेव्हा मी जन्म घेतो. आताही हे आप्त असले व वंदनीय असले तरी ते अविवेकाने वागले आहेत. व आता तू माघार घेतलीस तर दुसऱ्यांवर अन्याय केला तरी काही कोणाचे बिघडत नाही. असे विचार समाजात प्रसार पावतील. थोडक्यात म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो असेच जणू भगवंतांना म्हणायचे होते. म्हणून ते अर्जुनाला सांगतात तू युद्धासाठी उभा राहा. तू क्षत्रिय आहेस म्हणून अन्यायाचे परिमार्जन करण्यास तुला स्थिर बुद्धीने तुझ्या क्षत्रिय धर्माला जागून युद्ध करावयाचे आहे स्थितप्रज्ञ बुद्धीने, म्हणजेच कुठलाही दुष्टभाव मनात न ठेवता सगळ्यांना सारखे मानून लढलास तर त्याचे पाप तुला लागणार नाही. “तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय: ” असे कृष्ण वारंवार अर्जुनाला सांगतात.

आणि हे आत्म्याबद्दलच्या मी सांगितलेल्या ज्ञानामधूनही निष्काम कर्मयोगामधूनही तुला हे समजत नसेल तर तू माझा खरा भक्त आहेस म्हणून मला फक्त शरण ये आणि मी सांगतो त्यावर विश्वास ठेवून युद्ध करता उठ. कारण तुझ्याकरता योग्य तेच मी सांगतो आहे. परंतु तुझा कर्माबद्दलचा मोह नष्ट होऊ देऊन मगच मला शरण ये. ज्ञानानंतर स्थितप्रज्ञ होऊन तथा मला शरण येऊन केलेल्या या युद्धरूपी कर्तव्य कर्माने अखेरीस तुला मोक्षच मिळेल.

व्यवहारातही वडीलधारे पुष्कळदा समजावून सांगतात. तरीही न ऐकल्यास मोठ्यांना जीवनाचा अनुभव असतो. त्या आधारावर ते आपल्या मुलांना निश्चयाने सांगतात, ‘मी सांगतो तसे कर’. बहुतांश वेळा मुलांना त्याचा फायदाच होतो.

तसेच आपल्या मनात खूप गोष्टींचा संभ्रम निर्माण होतो त्यावेळी व. पु. काळ्यांनी म्हटल्याप्रमाणे आपण अर्जुनच असतो. त्यावेळी कृष्णही आपल्यालाच व्हावे लागते. कारण प्रत्येक वेळी आपल्याला कृष्णाच्या रूपात कोणी भेटेलच असे थोडीच असते! आपण आपले कृष्ण होतो त्यावेळी गीतेचा कुठलाही अध्याय मराठीतून वाचायला घेतला तरी काही ना काही मार्गही सापडतोच. व समोरच्या संकटातून मुक्ती पण मिळवता येते. म्हणजेच संकटातून मार्ग शोधता येतो. कृष्णाने ज्ञान -कर्म -भक्ती मधून सांगितलेली मोक्ष कल्पना मांडण्याची माझी योग्यता पण नाही. तेवढे माझे ज्ञान पण नाही. पण आजच्या गीता जयंतीच्या दिवशी केलेला तोकडा प्रयत्न गोड मानून घ्यावा.

‌ सर्वांना नमस्कार व धन्यवाद!

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आणि तो जाड होऊ लागला…  – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

☆ आणि तो जाड होऊ लागला…  – लेखक – अज्ञात ☆  श्री सुहास रघुनाथ पंडित 

आणि तो जाड होऊ लागला…

माणूस भुकेची किंमत न करता अन्नाची किंमत करायला लागला आणि तो जाड होऊ लागला.

अनलिमिटेड थाळी किंमत वसूल होऊन वर थोडीफार खाण्याचा प्रयत्न करू लागला.

एका वेळच्या भुकेची गरज एक रोटी असताना महागडी भाजी संपविण्यासाठी जास्तीची रोटी आणि राईस मागवून खाऊ लागला.

महागड्या डिशेस खाण्याच्या नादात भरपूर लोणी तुपात घोळलेले पदार्थ बिनदिक्कत चापू लागला.

घरचा स्वयंपाक शिल्लक राहिला तरी चालेल पण हॉटेलमधली डिश चाटून पुसून संपवू लागला.

पैसे खर्च झाले तरी चालेल पण बायको माहेरी गेल्यावर पदार्थ घरी करायचे कष्ट न करता, बाहेर जाऊन खाणे श्रेयस्कर समजू लागला.

मिसळ खायला पाव आणि पाव संपवायला अनलिमिटेड तर्री हाणू लागला.

हॉटेलमध्ये संध्याकाळी भरपूर खाल्ले तरी रात्री घरी पोळीभाजी खाल्ल्याशिवाय जेवण झाल्यासारखे वाटत नाही म्हणून रात्री सुद्धा घरी आडवा हात मारून जेवू लागला.

हॉटेल हि गरजेची सुविधा असणे विसरले गेले आणि चैन हि माणसाची नित्य गरजेची सवय बनली.

नुसतेच खाणे बदलले असे नाही तर खाण्यानंतर चहा किंवा कॉफी बरे वाटू लागले.

जेवताना कॉल्डड्रिंक मानाचे होऊ लागले.

पूर्वीच्या जेवणाच्या ताटावरच्या गप्पा हॉटेलमधल्या टेबलावर घडू लागल्या आणि गप्पांच्या वेळे बरोबर खाण्याची बिलेही वाढू लागली.

आम्ही दोघांनी मिळून कैरीचं लोणचं केलं किंवा आम्ही दोघांनी मिळून पापड केले असे कामाचे सहचर्य कुणाकडूनच कधी ऐकू आलं नाही.

कामाच्या विभागणीत स्त्री पुरुष समानता आलेली फार क्वचित दिसली पण आळशीपणामध्ये मात्र स्त्री पुरुष समानता हटकून आली.

स्वयंपाक बिघडला म्हणून घरी बायकोला घालून पाडून बोलणारे महाभाग हॉटेलमध्ये जे समोर येईल ते माना डोलवून डोलवून खाऊ लागले आणि निषेधाची वाक्य बाहेरच्या वहीत नोंदवून ठेऊ लागले.

किंवा अगदीच घरगुती किंवा साधे हॉटेल असेल तर त्या बदल्यात दुसरा पदार्थ फुकटात मिळवू लागले.

हळूहळू स्वयंपाकाची कला घरांमधून नाहिशी होते कि काय अशी भिती वाटू लागली आहे.

कुणाला घरी जाऊन भेटणे या पेक्षा हॉटेलमध्ये भेटणे जास्त प्रशस्त वाटू लागले आहे.

कुणाच्या घरी जाणं झालंच तर चहाच्या ऐवजी कोल्डड्रिंक्स आणि नाश्त्याच्या ऐवजी ब्रँडेड चिवडा लाडू किंवा सामोसे आणि पॅटिस ऑफर होऊ लागले आहेत.

गरमागरम पोहे पाच मिनिटात करून आपुलकीने पुढ्यात ठेवणारी आईची पिढी आता पंचाहत्तरीची झाली आहे.

या गल्लोगल्ली उघडलेल्या हॉटेल्सनी तसेच महागड्या आणि स्टायलिस्ट हॉटेल्सनी आपली खाद्य संस्कृती पूर्णपणे बदलू लागली आहे.

महाराष्ट्रीय पदार्थ तर हळूहळू विस्मरणात जाऊ लागले आहेत.

कुरड्या पापड्या भुसवड्या भरल्या मिरच्या पंचांमृत आता गौरीच्या जेवणापुरत्याच आठवणीत राहिल्या आहेत आणि त्या सुद्धा ऑर्डर देऊन मागवाव्या लागत आहेत.

फोडणीची पोळी फोडणीचा भात आताशा पूर्णपणे दिसेनासाच झाला आहे.

कुणाच्याही घरी जाऊन वहिनींच्या हातची हक्काने खायची पिठलं भाकरी आता शेकडो रुपये देऊन विकत मिळू लागली आहे.

कुणाच्या घरी हक्काने जेवायला जायची सोयच राहिलेली नाही, खिशात पैसे नाहित म्हणून आलेला दिसतोय अशी शंका सुद्धा घेतली जाऊ लागली आहे.

आमच्या पिढीतल्या सर्व वहिनींना स्वयंपाक येतो याची सगळ्यांनाच खात्री आहे पण मुलांच्या पिढीमध्ये मात्र सगळंच जरा अवघड आहे.

आता सुखी संसारासाठी विवाहेच्छूक स्त्री पुरुषांसाठी किंवा नवपरिणीत जोडप्यांसाठी एकत्रित पाककलेचे वर्ग सुरू करणे अनिवार्य होऊ लागले आहे असे मला वाटते.

स्वतःपुरतातरी स्वयंपाक दोघांनाही करता यायला हवा असे माझे मत आहे.

लेखक : अज्ञात

संकलन व प्रस्तुती : सुहास पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्रतोपासना – २. अन्नाचा सन्मान ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

व्रतोपासना – २. अन्नाचा सन्मान ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आपण बऱ्याच गोष्टी नकळत करत असतो. त्यात काही चुकीच्या गोष्टी पण आपल्या हातून नकळत घडतात. त्याच जर हेतुपुरस्सर बदलल्या तर ती सवय होऊन जाते. आणि भावी पिढी साठी ते संस्कार बनून जातात. यातील काही आवश्यक गोष्टी विविध कारणांनी मागे पडत चालल्या आहेत. यातील एक गोष्ट म्हणजे अन्नाचा सन्मान

आपल्याही नकळत आपण बरेचदा अन्नाचा अपमान करत असतो. कदाचित ते लक्षात पण येत नाही. इथे मला एक गोष्ट आठवते. एक खूप मोठे कुटुंब असते. घरातील सगळे काम करणारे असतात. रात्री ते एकत्र जेवत असतात. एक दिवस घरात फक्त तांदूळ असतात. त्या घरातील मोठी सून त्या तांदुळाची खिचडी करायला ठेवते. तितक्यात तिची सासू येते. तिला वाटते सून मीठ घालायचे विसरली म्हणून ती त्यात मीठ घालते. असेच घरातील तिन्ही सुनांना वाटून प्रत्येक जण स्वतंत्र पणे मीठ घालून जाते. त्याच वेळी लक्ष्मी व अवदसा या घरात असतात. आणि या घरात कोणी राहायचे या वरून त्यांच्यात वाद होतो. आणि असे ठरते, या कुटुंबातील एकाही व्यक्तीने अन्नाला नावे ठेवली नाही तर त्या घरात लक्ष्मी निवास करेल. आणि कोणी नावे ठेवली तर अवदसा त्या घरात राहील. त्या दोघी घरात एका बाजूला बसून निरीक्षण करत असतात. घरातील सर्व पुरुष मंडळी प्रथम जेवायला बसतात. सासरे पहिला घास घेतात त्याच वेळी भात खारट झाल्याचे लक्षात येते. पण घरातील स्त्रियांचे कष्ट लक्षात घेऊन ते काहीही न बोलता गुपचूप जेवतात. ते बघून त्यांची मुलेही गुपचूप जेवतात. त्यामुळे छोटी मुले, स्त्रिया कोणीही काहीही न बोलता जेवतात. थोडक्यात अन्नाला कोणीही नावे ठेवत नाहीत. म्हणजेच अन्नाचा सन्मान ठेवतात. आणि लक्ष्मी कायमची त्या घरात निवास करते.

अन्नाचा सन्मान हे खूप मोठे व महत्वाचे व्रत आहे. त्या सन्मान करण्यात शेतकरी त्यांचे कष्ट, घरातील स्त्रिया त्यांची कामे या सगळ्यांचा सन्मान असतो. परंतू हल्ली वाया जाणारे अन्न पाहिले की मनाला त्रास होतो. एकीकडे आपण अन्न हे पूर्णब्रह्म म्हणतो. त्यावर आपला देह पोसला जातो. जेवणाला उदर कर्म न मानता यज्ञ कर्म मानतो. मग अन्न टाकून देताना ही भावना का विसरतो? असा प्रश्न पडतो. एखाद्या कार्यात बघितले तर अन्नाची नासाडी दिसते. आणि त्याच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला अन्नासाठी व्याकूळ झालेले लोक दिसतात. आणि अन्न वाया जाणार नाही, या साठी पण कायदे करण्याची आवश्यकता आहे का? असा प्रश्न पडतो.

पुण्यातील एका कार्यालयात मी असा अनुभव घेतला आहे. ताटात कोणी अन्न ठेवून ताट ठेवायला गेले की तेथे उभी आलेली व्यक्ती ते ताट ठेवू देत नाही. ताट रिकामे करून आणा म्हणून ती व्यक्ती सांगते. सावकाश संपवा अशी विनंती केली जाते. सुरुवातीला लोकांना हे आवडले नाही. पण त्या कार्यालयाचा तो नियमच आहे. एकदा समजल्यावर लोक मर्यादेत वाढून घेऊ लागले. एका डायनिंग हॉल मध्ये पण अशी पाटी लावली आहे. ताटातील अन्न संपवल्यास २० रुपये सवलत मिळेल. असे सगळीकडे व्हावे असे वाटते. त्याही पेक्षा आपण ठरवले तर अन्नाचा योग्य सन्मान करु शकतो. आणि आपले बघून पुढची पिढी हेच संस्कार स्वीकारणार आहे.

अन्नाचा सन्मान तर पूर्वी पासूनच आहे. पण पुन्हा त्याला नव्याने उजाळा देण्याची वेळ आली आहे. तर अन्नाचा सन्मान हे व्रत आचरणात आणण्यास कोणाची हरकत नसावी.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares