मराठी साहित्य – विविधा ☆ “शिशिरऋतूचे  गान…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “शिशिरॠतूचे गान…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

दोन दिवसांपासून वातावरणात हलका बदल व्हायला सुरवात झालीयं. ही शिशिराची चाहूल . हे बदलते ऋतू आणतात आयुष्यात वैविध्य, रंगत आणि शिकवितात एक मोलाचा संदेश. आयुष्यात दिवस हे देखील ऋतुंप्रमाणे बदलत असतात. त्यामुळे कुठल्याही चांगल्या स्थितीत हुरळून जायचं नाही आणि कुठल्याही वाईट स्थितीत डगमगायचं नाही, कारण दिवस हे ऋतुंप्रमाणे बदलत असतात.

दिनदर्शिकेप्रमाणे मार्गशीर्ष  आणि पौष ह्या मराठी महिन्यात शिशिर ऋतू असतो. ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी ह्या इंग्रजी महिन्यात शिशिर ऋतू असतो.

शिशिर ऋतूमध्ये झाडांची पाने पिवळी पडतात व गळतात. त्यानंतर त्या झाडांना नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होते. या ऋतूत काही प्रमाणात गारवा व थंडी असते आणि काही प्रमाणात उन्हाळ्याची चाहूल देखील एकीकडे येणे सुरू होते. या ऋतूत फळे व फुले बहरलेली असतात . 

या काळात उत्तरेकडून थंड वारे वाहत असतात. उन्हाळा सुरू झाला की पहिले दोन चार दिवस ती पानगळ,पिकली पानं गळतांना बघून मन हुरहुरतं,उदास होतं पण हे तर निसर्गचक्र. परत नवीन पालवी फुटतांना बघितली की परत मन हरखतं,प्रफुल्लित होतं.सगळे आपले मनाचे खेळ. आंब्याचा मोहोर,डवरलेला गुलमोहर आणि फुललेला पळस बघणं म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणारं सुख,आनंद.तो पळस आणि गुलमोहर डोळ्यात किती साठवून ठेवू असं होतं खरं.

ह्या शिशिराची आठवण होतांना हमखास आठवण होते वा.रा.कांत ह्यांच्या “शिशीरऋतूचे गान ” ह्या कवितेची.त्या कवितेतील शेवटचे कडवे आणि त्याचे माझ्या शब्दांत रसग्रहण पुढीलप्रमाणे

हलके हलके हसते,गळते तरुचे पान न पान

पानझडीत या ऐकुन घ्या गं शिशीर ऋतुचे गान

 

फुले जळाली, पाने गळली,  

फळांत जरी रसधार गोठली,

सर्व स्रुष्टी जरी हिमे करपली,

 

पिवळ्या पानांच्या मनी फुलते वसंत स्वप्न महान

पानझडीत ह्या ऐकून घ्या गं शाशीरऋतुचे गान

खरंच हा ऋतु साक्षात वृक्षांच्या उदाहरणावरुन आपल्याला शिकवून जातो.अगदी हलके हलके सहजतेने वृक्षाची पानगळ झाली, फुलं जळाली, अगदी परिसीमा म्हणजे अवघी स्रुष्टी जरी हिमे करपली. तरी आपलं मनं मात्र कायम आशावादी सकारात्मक ठेवा कारण येणारा उद्या कायम आपल्यासाठी वसंत ऋतू म्हणजे भरभराट घेऊन येणारच आहे.त्यामुळे खचून न जाता उद्याची वाट बघत आशावादी सकारात्मक हसतमुख रहा. आपल्यातील कित्येक आदर्श पिकली पानं जरी गळून पडली तरी त्यांचा आदर्श आपल्याला कायम शिकवण देत राहील

त्यांच्या आठवणी,आदर्शवाद आपल्याकडे असलेला अनमोल ठेवा असेल,तो कायम स्मरणात ठेवा आणि आचरणात आणा.

आजचा शिशिर खूप मोलाची शिकवण देऊन गेला हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – एक अफलातून सोमवार ! – ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 😂 चं म त ग ! 😅 एक अफलातून सोमवार ! 💃☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“अहो उठा, पाच वाजून गेले!”

“हो गं, जरा गजर तर होऊ दे “

“मी दोनदा गजर बंद केलाय म्हटलं!”

“दोनदा ?”

“मग, साडे चारचा गजर  एकदा त्याच्या वेळेला झाला तेव्हा आणि मी बंद केल्यावर snooz ला जाऊन परत पाच वाजता झाला तेंव्हा “

“अरे बापरे, म्हणजे आता वाजले तरी किती ?”

“साडेपाच वाजत आले, मला पण सगळे आटपून आठ पाच पकडायची आहे”

“जाऊ दे, आज कंटाळा आलाय ऑफिसला जायला”

“हे तुमच दर सोमवारच झालंय हल्ली”

“हल्ली म्हणजे?”

“हल्ली म्हणजे डोंबिवलीला रहायला आल्यापासून म्हणतेय मी”

“हो, पण फ्लॅटात रहायची हौस कोणाला होती?”

“म्हणजे, हौस काय मला एकटीलाच होती? उलट आपल्या गिरगांवातल्या जागेपासून, माझी आर्यन education ची शाळा हाकेच्या अंतरावर आणि तुमच BMCच ऑफिस दोन बस स्टॉपवर होतं.”

“हो नां, मग मी जे म्हणतोय ते बरोबरच आहे ना?”

“काय डोंबलाच बरोबर?

अहो, तुम्हांलाच BMC मधे प्रमोशन मिळाल्यावर गिरगांवातल्या चाळीतल्या दोन खोल्या, काडेपेटीच्या आकाराच्या वाटायला लागल्या  आणि तुम्ही तसं बोलून पण दाखवत होतात हजारदा, विसरले नाही मी अजून.”

“अग म्हणून तर मी गिरगांवातली जागा विकून ठाण्याला वन बेडची जागा घेऊया म्हटलं, तर तुझ्या आईनं खोडा घातला त्यात”

“उगाच माझ्या आईला दोष देवू नका यात”

“का, का दोष देवू नको? तिच्यामुळेच तर आपण येवून पडलो ना डोंबिवलीला?”

“हो क्का, मग मला आता एक सांगा, तुम्ही जी ठाण्याला वन बेड बघितली होती, ती कुठेशी होती हो ?”

“कुठेशी म्हणजे तुला जस काही माहितच नाही, वाघबीळला!”

“हां, म्हणजे सांगायला ठाण्याला राहतो, पण स्टेशन पासून रिक्षाने फक्त वीस मिनिटावर, काय बरोबर ना ?”

“अग पण तिथे सुद्धा हजारो लोकं राहून, नोकरी साठी रोज मुंबई गाठतातच ना ?”

“बरोबर, पण त्याच वीस मिनिटापैकी फक्त दहा मिनिट पुढे ट्रेनने प्रवास करून तुम्ही डोंबिवलीला पोचता त्याच काय ?”

“ते जरी खरं असलं तरी आपली जागा स्टेशनपासून लांब असल्यामुळे, इथे डोंबिवलीला उतरल्यावर सुद्धा रिक्षाच्या भल्या मोठया लायनीत, वीस वीस मिनिट उभ रहावं लागतच ना?”

“हो, पण या सगळ्या गोष्टीत तुम्ही एक महत्वाचं विसरताय ?”

“काय, दोन सोसायटया सोडून तुझी आई रहाते ते?”

“ते तर आहेच, पण त्या वाघबीळच्या जागेच्या बजेट मध्ये माझ्या आईने आपल्याला डोंबिवलीला दोन बेडची जागा मिळवून दिली ते!”

“अग हो, पण ठाणा म्हटलं की कसं ऐकायला जरा बरं वाटत आणि शिवाय स्टेटस वाढल्यावर त्या प्रमाणे नको का रहायला?”

“हवं ना, मी कुठे नाही म्हणत्ये ? मग त्या चांगल्या BMC च्या quarters मिळत होत्या मोठया, त्या का नाही घेतल्यात हो ? म्हणजे ही वेळ आली नसती नां?”

“तुला ना काही कळत नाही”

“काय, काय कळत नाही?”

“अग, quarters घेतली की house allowance मिळत नाही आणि शिवाय तिकडे सुद्धा रोज ऑफिस मधल्या लोकांचेच चेहरे बघायचे ना?”

“मग इथे गोपाळ नगर मधल्या आपल्या आराधना सोसायटीत तुमचे शेजारी पाजारी रोज बदलतात की काय ?”

“अग तसं नाही, पण नाही म्हटलं तरी मॉनिटरी लॉस हा होतोच होतो आणि शिवाय…”

“ही तुमची पळवाट झाली”

“अग पळवाट वगैरे काही नाही. Quarters न घेण्यात दुसरा पण एक महत्वाचा मुद्दा आहेच.”

“अस्स, तो कोणता?”

“अग रिटायर झाल्यावर quarters सोडावी लागते आणि त्या जागेची आपल्याला नंतर इतकी सवय झालेली असते, की रिटायरमेंट येई पर्यंत आपण विसरूनच जातो, की आता काही महिन्यातच आपल्याला ही जागा सोडायची आहे आणि रहायची दुसरी सोय करावी लागणार आहे आता ते”

“हो ना, पण आता आपण काही quarters मधे रहात नाही त्यामुळे ती भीती नाही! तेव्हा आता उठा आणि पाणी

जायच्या आत सगळं आवरून ऑफीसला पळा”

“अग खरंच कंटाळा आलाय आज.  तू पण दांडी मारतेस का ?”

“अशक्य, आताच नवीन वर्ष सुरु झालय आणि परीक्षा…”

“मी तुला कधी सांगतो का गं दांडी मारायला ? आज जरा आग्रह करतोय तर एवढा काय भाव खातेस”

“पुरे, पुरे, तुम्ही आता जाताय अंघोळीला का मी जाऊ ?”

“असं काय ते ?आज जरा मजा करू, गोपी टॉकीजला पिच्चर टाकू आणि मॉडर्न प्राईड मध्ये मस्त हादडू”

“अरे बापरे, आज कसले डोहाळे लागलेत एका माणसाला?”

“म्हणजे नवरे मंडळीच विसरतात असं नाही तर ?”

“मी नाही समजले तुम्हाला काय म्हणायचं आहे ते, उगाच आमच्या सारखं कोड्यात बोलू नका, सरळ काय ते सांगा”

“म्हणजे तुम्ही बायका कोड्यात बोलता हे मान्य आहे तर तुला ?”

“आता बऱ्या बोलाने सांगणार आहात की जाऊ मी अंघोळीला?”

“मॅडम आज जर का तुमचा वाढदिवस असता आणि मी तो विसरलो असतो, तर अख्ख घर डोक्यावर घेतल असत आपण !”

“होच मुळी, आपल्या एकुलत्या एक बायकोचा वाढदिवस नवरा विसरतो म्हणजे काय?”

“आणि नवऱ्याचा वाढदिवस बायको विसरली तर चालतं वाटतं मॅडम ?”

“Oh my God, सॉरी सॉरी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !”

“It’s OK, थँक्स! मग काय  आज मी सांगितलेला प्रोग्राम follow करणार की दुसरं काही विशेष तुमच्या डोक्यात आहे मॅडम ?”

“दुसरं काही विशेष नाही, पण आज एक काम मात्र मी न चुकता नक्कीच करणार आहे”

“काय सांगतेस काय, खरंच?”

“खरंच म्हणजे? तुम्हाला माहित्ये मी शाळेत मुलांना खरं बोलायला शिकवते आणि स्वतः चुकून सुद्धा खोटं बोलत नाही.”

“अग हो, पण आज एक काम नक्की करणार आहेस म्हणजे काय करणार आहेस, ते आणखी सस्पेन्स न वाढवता सांगशील का प्लिज?”

“सांगते ना, आज कुठल्याही परिस्थितीत आठ पाच चुकवायची नाही म्हणजे नाही !”

© श्री प्रमोद वामन वर्तक

२४-०१-२०२३

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग – ५३ – सायक्लोनिक हिंदू ? ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग – ५३ – सायक्लोनिक हिंदू ? ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

वृत्तपत्रातील विवेकानंद यांच्या बद्दल आलेल्या, मजकुरामुळे अस्वस्थ झालेल्या बॅगले यांनी अॅनिस्क्व्याम हून पत्रात लिहिलं, “विवेकानंद यांच्या बद्दल आदरभाव व्यक्त करण्याची संधी मला मिळत आहे.याचा माला फार आनंद वाटतो. जे कोणी त्यांच्या विरूद्ध  लिहीत आहेत,त्यांच्या मनात विवेकानंदांची श्रेष्ठता आणि आध्यात्मिक धारणा यांबद्दलचा  मत्सर आहे. धर्माचा उपदेष्टा आणि सर्वांनी ज्याचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवावे अशी त्यांच्या तुलनेची दुसरी योग्य व्यक्ती मला दिसत नाही.ते संतापी आहेत हे साफ खोटे आहे. माझ्या घरी त्यांचे तीन आठवड्याहून जास्त काळ वास्तव्य होते. माझ्या कुटुंबातील सर्वांशी त्यांचे वागणे अतिशय सौजन्याशील होते. आनंद देणारा एक मित्र आणि हवाहवासा वाटणारा पाहुणा असे त्यांचे वागणे बोलणे असे”.

“ शिकागोचे हेल कुटुंब अशीच साक्ष देणारे आहेत. ते प्रेस्बिटेरियन आहेत,पण विवेकानंदन यांना आपल्यापासून दुसरीकडे कोठे जाऊ देण्यास ते तयार नसत. विवेकानंद हे असे एक सामर्थ्यसंपन्न आणि अतिशय थोर व्यक्तिमत्व आहे की जे ईश्वराचा हात धरून चालत राहणारे आहे. त्यांची भाषणे ऐकून अनेकजण उद्गार काढतात की, असे बोलणारा दुसरा वक्ता आपण या आधी कधी ऐकला नाही.ते श्रोत्यांना एका उदात्त विश्वात घेऊन जातात आणि ऐकणारे सारेजण त्यांच्या धर्माविषयक श्रद्धेशी तद्रूप पावतात. माणसाने निर्माण केलेले पंथ आणि संप्रदाय या सर्वांच्या अतीत असणारे असे काहीतरी श्रोत्यांना जाणवते . विवेकानंदांना समजून घेतले आणि त्यांच्या सहवासात एका घरात राहता आले तर , प्रत्येक व्यक्ती उन्नत होऊन जाईल.प्रत्येक अमेरिकन माणसाने विवेकानंद जाणून घ्यावेत. आणि भारताजवळ असतील तर असेच आणखी विवेकानंद त्याने आमच्याकडे पाठवावेत. हे मला हवे आहे”.

प्रा.राईट यांनी विवेकानंद यांच्या असामान्य योग्यतेबद्दल सर्व धर्म परिषदेसाठी पत्र लिहिलं होतं, त्याच अॅनिस्क्व्याम मधून बॅगले यांनी हे पत्र लिहिलं होतं.मिसेस स्मिथ यांनी विवेकानंद यांच्या बद्दल छुपा प्रचार चालुच आहे हे ऐकून पुन्हा बॅगले यांना न राहवून विचारले होते. बॅगले यांनी पुन्हा उत्तर दिले ,त्यात आधीच्या पत्रातील मजकूर होताच पण त्यात चिडून म्हटले होते, “ माझे अनेक नोकर आहेत. मोलकरणी आहेत. सारे जण माझ्याकडे अनेक वर्षे काम करीत आहेत”.म्हणजे बदनामी करण्याची किती हीन पातळी गाठली होती. त्यांनी काही तक्रार नाही केली आणि हे सांगणारी ही कोण? त्याच्या नंतर बॅगले यांच्या  मुलीनं स्मिथ यांना कडक पत्र लिहून कानउघडणी केली.

चारित्रहननाची ही मोहिम सव्वा वर्ष सुरू होती पण विवेकानंद यांनी काहीही व्यक्त केले नव्हते, शांतपणे ते सहन करत होते.

आपणही असे अनुभव घेत असतो. मत्सरी लोक आपल्या आसपासच असतात. त्यामुळे इतर लोकांचे आपल्याबद्दल कान फुंकायचे ,विरोधी मत तयार करायचे अशा चुकीच्या गोष्टी लोक करत असतात. पण बॅगले यांच्या सारख्या सत्यासाठी परखड शब्दात कान उघडणी करणारे असले की किमान दुसरी बाजू लोकांसमोर येते आणि न्याय अन्याय, खरे खोटे, काय? कोणाचे? हे स्पष्ट होते, हेही तितकेच खरे आहे. ऐकावे जनाचे पण करावे मनाचे!    

डेट्रॉईटला विवेकानंद यांची आणखी व्याख्याने होत होती. इतक वादळ उठलं होतं पण स्वामीजी धर्म परंपरा, स्त्रिया, निर्बंध ,त्यातून तयार झालेल्या रूढी यावर भारत व अमेरिका यांच्यावर तुलनात्मक बोलत  होते.त्यांनी वाचलेला आणि पाहिलेला अमेरिका आणि आपल्या देशाची  मूल्ये आणि शिकवणूक त्या लोकांना, श्रोत्यांना समजून सांगत होते.त्यांच्यात आणि श्रोत्यांमध्ये मनमोकळा संवाद होत होतं. गप्पा होत होत्या. भारतातील धार्मिक आणि सामाजिक अस्वस्थेवर प्रश्न विचारून लोक स्वामीजींकडून समाधान करून घेत. विवेकानंद सर्व प्रश्नांची उत्तरे प्रांजळपणे देत असत. काही दोष तर सरल मान्य करत आणि काही प्रश्न सुटणे अवघड आहे हेही सांगत. राजकीय आक्रमणामुळे सामाजिक निर्बंध स्वीकारावे कसे लागतात ते समजावून देत. हेच निर्बंध मग पुढे जाऊन कशा रूढीत बदलतात हे सविस्तर सांगत .

भारतातील स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल लोक जाणून घ्यायला उत्सुक असत.

इथे एका व्याख्यानात विवेकानंद सांगत होते, “ भारतातील स्त्रिया काही शतकांपूर्वी मोकळेपणाने फिरत असत. सिकंदराने केलेल्या स्वारीच्या वेळी तर राजकन्याही इकडे तिकडे संचार करीत होत्या. पण पुढे मुसलमानांच्या उगारलेल्या तलवारीमुळे आणि इंग्रजांच्या रोखलेल्या बंदुकांमुळे आन्तरगृहाचे दरवाजे बंद करावे लागले होते. पुढे विनोदाने म्हणाले दाराशी वाघ आला तेंव्हा दार लावून घेतले. असे निर्बंध पुढे रूढी झाल्या.

भारतातील स्त्रिया या विषयवार विवेकानंद यांनी व्याख्यान दिले. ते खूप गाजले. अमेरिकेतील बुद्धीमान आणि कर्तृत्व संपन्न स्त्रियांबद्दल त्यांनी कौतुक केले. पण ते करताना हेही बजावले की, वैवाहिक जीवनात चारित्र्याचा आणि पतिपत्नीच्या नात्यातील निष्ठेचा अभाव हा पाश्चात्य संस्कृतीचा एक महान दोष आहे. वृत्तपत्रीय वादळात ही डेट्रॉईट मध्ये विवेकानंद यांच्या विचारांनी लख्ख प्रकाश पडला होता. तीन आठवड्याचा हा काळ भरगच्च कार्यक्रमांचा झाला.

मिसेस बॅगले यांच्याकडे विवेकानंद राहत होते पण थॉमस विदरेल पामर यांच्या आग्रहाखातर काही दिवस स्वामीजी त्यांच्याकडे राहायला गेले होते. पामर मोठे उद्योगपती आणि अमेरिकेचे सिनेट सदस्य होते.तिथल्या स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून त्यांनी ४० वर्षे प्रयत्न केले होते.कोलंबियन एक्सपोझिशन चे चीफ कमिशनर म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांनी तर डेट्रॉईट मधल्या अनेक लोकांना सतत आमंत्रित करून भोजन समारंभ केले. सर्व क्षेत्रातल्या नामवंतांसहित कोणीही स्वामीजींना जवळून बघितले नाही असा कोणी बाकी राहिला नाही. स्वामीजींच्या एव्हढ्या प्रेमात ते पडले होते.

विवेकानंद यांची व्याख्याने १८९३ च्या नोहेंबर पासून स्लेटन लायसियम लेक्चर ब्यूरो यांच्या झालेल्या कारारा नुसार झाली होती.पण दोन महीने होत नाहीत तो विवेकानंद यांना शंका येऊ लागली. आपली फसवणूक होते आहे हे लक्षात आलं. एका कार्यक्रमाचे उत्पन्न दोन हजार डॉलर्स झाले असताना विवेकानंदांना फक्त दोनशे डॉलर्स देण्यात आले होते. त्यांनी हेल यांचा सल्ला घेतला. पामर यांनाही सांगितले . या करारा बाबत वकिलांचा सल्ला ही घेतला. आणि सरळ स्लेटन यांना रीतसर सांगून ते या करारातून मुक्त झाले. यात पामर यांनी स्वता शिकागोला जाऊन मदत केली. तीन वर्षांचा झालेला करार तीन महिन्यातच संपला होता. अतिशय वाईट अनुभावातून एकच चांगली गोष्ट घडली होती की, तिथल्या थोरा मोठ्यांचा परिचय व भेटी झाल्या होत्या. प्रसिद्धीही भरपूर मिळाली होती.

तिथल्या जाहिरात बाजी आणि धावपळीला ते कंटाळलेच होते. सायक्लॉनिक हिंदू म्हणून त्यांची जाहिरात केली होती. जी स्वामीजींच्या शांत आणि गंभीर व्यक्तिमत्वाला शोभेशी नव्हतीच.ते हेल भगिनींना याविषयी पत्रात म्हणतात , “ मी तुफानी वगैरे काही नाही त्याहीपेक्षा वेगळा आहे. मला जे हवे आहे ते या करारा नुसार कराव्या लागणार्‍या कामात नाही. हे तुफानी वातावरण मी आता फार काळ सहन करू शकत नाही. स्वता पूर्णत्व प्राप्त करून घेणे आणि काही मोजक्या स्त्री पुरूषांना पूर्णत्वाकडे नेणे हा माझा मार्ग आहे. असीम कर्तृत्वाची माणसे तयार करावीत अशी माझी कल्पना आहे. आलतूफालतू माणसांमध्ये आपली विचार रत्ने विखरून टाकावीत आणि वेळ, शक्ति आणि आयुष्य व्यर्थ घालवणे हा माझा मार्ग नाही”

व्याख्यानच्या द्वारे पैसे मिळवायचे नाहीत असा निर्णय विवेकानंद यांनी घेतला.भारतात जाऊन एखादी  शिक्षण संस्था उभी करायची ही योजना पण बाजूला  ठेवली. आपण योजना प्रत्यक्षात आणणार नसलो तर मिळालेल्या देणग्या ठेऊन घ्यायचा काय अधिकार ? म्हणून ज्यांनी पैसे दिले होते त्यांना ते परत करू लागले तर त्या लोकांनी ते नाकारले. त्यांना बाकीच्या तपशीलाशी काही देणे घेणे नव्हते. स्वामीजींवरील प्रेम आणि आदरापोटी ते पैसे दिले होते. भारतात आता परत जावे इथला मुक्काम हलवावा असे मनात आले होते पण विवेकानंद यांना आता न्यूयॉर्क चे आमंत्रण आले होते…

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “स्थळं बघणे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “स्थळं बघणे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काल “स्थळ” ह्या संकल्पनेबद्दल तसे लिहीले होतेच. तेव्हा “स्थळं बघणे”हा कार्यक्रम अरेंज्ड मँरेज करणा-या उपवर मुलामुलींसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी अपरिहार्य मार्ग बनला आहे. पूर्वी नातेवाईक भरपूर असायचे, लोकं एकमेकांशी जुळलेली असायची परंतु हल्ली लोकसंपर्क कमी कमी होत जाण्याच्या प्रक्रीयेमुळे “लग्न जमविणे” हे मुलं व पालक ह्यांच्या साठी एक अवघड परीक्षाच होऊन बसलीयं.

विशेषतः उपवर मुलींचे प्रमाण हे उपवर मुलांच्या तुलनेत कमी असल्याकारणाने  उपवर मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक जटील समस्याच होऊन बसलीयं. अरेंज्ड मँरेजमध्ये एकतर परिचीत वा नातलग ,नाही तर विवाहमंडळं मध्यस्थांची भूमिका पार पाडतात. आणि ब-याच लोकांच्या अनुभवातून असं निदर्शनास आलं की चांगलं स्थळं पदरी पाडण्याच्या नादात हे उपवर,त्यांचे पाल्य किंवा मध्यस्थी वा विवाहनुरुप मंडळं ही बोहल्यावर चढणा-याची बरेचसे गुणं चढत्या भाजणीतील माहिती सारखी जाहीर करतातं. मुलगा असो वा मुलगी, संसाराची सुरवातच मुळी खोटी, वाढीव माहिती, देऊन केल्या गेली तर तो संसारातील विश्वासाचा पायाच मुळी डळमळीत राहील. उलट मी तर म्हणेन आपले विचार, आपली मतं ही जशीच्या तशी जाहीर करावीत. त्या देवाला काळजी असते, आपल्या विचारांचा, मतांचा आदर करणारा पार्टनर आपल्याला कुठूनही मिळेल. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आलीच पाहिजे असं अजिबातच नसतं, त्यामुळे आपलं शिक्षणं, आपली कमाई ,आपले विचारं,मतं,आपल्या अपेक्षा ,आपल्या लेखी प्राधान्य ह्या गोष्टींचे अतिशय स्पष्टपणे तसेच मनमोकळ्या पद्धतीने आदानप्रदान व्हायला हे हवचं.

उदाहरण द्यायचंच झालं तर मुलीला फारशी घरकामाची आवड वगैरे नसली तर अजिबात बायोडाटा मध्ये गृहकर्तव्यदक्ष असले जडजूड शब्द वापरून भुलावण करु नये, तसचं मुलामुलीला माणस़ांची ,गोतावळ्याची फारशी आवड नसतांना प्रेमळ,मनमिळाऊ असली बिरुदं चिकटवू नयेत. तसचं मुलामुलीची कमाई सांगतांना कृत्रिम चलन फुगवट्यासारखी वाढवून सांगू नये, हे जर पाळले नाही तर अपेक्षांचा चक्काचूर केल्याचा ठपका अंगाला चिकटलाच म्हणून समजा. ह्या उलट एकदम खरीखुरी माहिती सगळ्यांनीच पुरवायचे ठरविले तर पुढील आयुष्य हे ब-याच प्रमाणात सुकर,सुरळीत होईल हे नक्की.

सध्या लग्न झाल्याबरोबर बेबनाव,घटस्फोट हे सर्रास काॅमन झालायं. पूर्वी मागील पिढी पर्यंत सहनशीलतेच प्रमाण ह्या पिढीपेक्षा जास्त होतं. त्यामुळे पटो वा न पटो जगासाठी तरी लग्न टिकविण्याकडे कल होता. परंतु आता काळ बदलललाय,कोणीही झुकायला, माघार घ्यायला तयार नसतं.ह्या परिस्थीतीत जर सांगितलेल्या गोष्टी खोट्या वा चूक निघाल्या तर ह्या पिढीतील तरुणाई सहन निश्चितच करतं नाही. आणि लग्न हे फक्त दोघांच नसतचं मुळी. ह्यामध्ये दोन्हीही कुटुंब इनव्हाॅल्व झालेली असतात. ह्या परिस्थितीचा विपरीत परिणाम दोन्ही कुटुंबां वर होऊ नये ही ईच्छा असल्यास आरोग्य, कमाई, आवडी,अपेक्षा,सवयी ह्या पंचसूत्री ची खरीखुरी माहिती ही एकमेकांना द्यावी तर आणि तरच ही कुटूंबसंस्था डळमळीत न होता सुखी आनंदी संसार बहरेल.शेवटी काय हो सगळ्यांना” नांदा सौख्य भरे” हेच हवं असतं.

नात्यांचही पण वृक्षासारखचं असतं. ते नातं रुजू द्यावं लागतं, फुलू,बहरू द्यावं लागतं,ते जपावं लागतं आणि मुख्य सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परस्परांना समजून घ्यावं लागतं,काही मिळवितांना काही सोडावं सुद्धा लागतं, तेव्हा कुठे ते नातं चांगलं टिकलं, मुरलं अस आपण म्हणू शकतो.

दुर्दैवाने आजच्या नवीन पिढीजवळ वाट बघण्यासाठी वेळ नसतो,संयम नसतो,त्याग हा शब्द डिक्शनरी मधून खोडून टाकलेला असतो आणि त्यामुळे हे नवीन रुजण्याच्या उद्देशाने निर्माण झालेलं नातं बहरण्याऐवजी कोमेजत जातं.आणि वेळीच सावरलं नाही तर पार निर्माल्य होतं. अर्थात हे आजकाल वाढत्या घटस्फोटाच्या प्रमाणावरूनच लक्षात येतं.

नवीन नात्यांना आकार देतांना एक गोष्ट पक्की. कुठल्याही दोन व्यक्तींचे शंभर टक्के सूर जुळणं शक्यच नसतं.कारण प्रत्येक जीव हा वेगवेगळी अनुवंशिकता, परिस्थिती,दृष्टिकोन व मानसिकता ह्यातून घडला असतो. वैवाहिक सूर जुळवितांना दोघांनाही स्वतःचे सूर जुळविण्या सोबतच बाकी इतर नाती सद्धा सांभाळावीच लागतात. नवीन पिढी खरोखरच खूप हुशार, जिद्दी आणि ठाममतांची आहे. त्यामुळे त्यांनी थोडी तडजोड केली,थोडासा स्वार्थ बाजूला सारला तर हे संकट संपूर्ण नेस्तनाबूत होऊन नवीन मुलं आपल्या बौद्धिक प्रगतीच्या जोरावर जास्त उत्तमप्रकारे संसार करु शकतील. त्या मुळे लग्न करतांना प्रत्येकाने हे वैवाहिक शिवधनुष्य योग्य रितीने कसे पेलता येईल ह्याचा आधी जरूर विचार करून, आपली स्वतःची मानसिकता बदलवून एक निराळा दृष्टिकोन समोर ठेऊन ह्या संसारात पडण्याची तयारी करावी. प्रत्येकाने दुसऱ्याकडे टक लावून बघण्याआधी वा परीक्षा बघण्याआधी स्वतःकडे पारखून बघून पहिल्यांदा स्वपरीक्षण करणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या ची क्षमता जाणण्याआधी स्वतःची कुवत प्रामाणिकपणे अभ्यासावी. एक नक्की खरोखरच सहजीवन  जगून त्याचा आनंद लुटायचा असेल तर मग प्रत्येकाने दोन पावलं स्वतः आधी मागे यायला शिकावचं लागेल.

एक सगळ्यातं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले सूर नीट जुळण्याआधीच नवीन जीव जन्माला घालण्याची घाई अथवा धाडस करुच नये.नाही तर येणाऱ्या जीवावर तो एक मोठा अन्याय ठरेल हे नक्की. नवीन जीवाची परवड करण्याचा प्रमाद तरी आपल्या हातून घडणार नाही ह्याची काळजी घ्यावी.

कदाचित ब-याच जणांच्या मते तडजोड हा मूर्खपणा असेल तरीही एक नक्की तडजोडी ने कदाचित आपल्याला सुख नाही लाभंत पण आपण न केलेल्या तडजोडी मुळे कित्येक आपल्याशी जोडलेल्या व्यक्ती ह्या दुःखी होऊ शकतात. म्हणून सुखी जरी नाही म्हणता आलं तरी साध्यासरळ संसारासाठी “तडजोड”हा एक उत्तम मार्ग ठरु शकतो.आणि वारंवार कराव्या लागणाऱ्या तडजोडी नंतर एक दिवस हा तुमचाच असतो आणि त्या दिवसानंतर हसतमुखाने  घरच्यांनी मान्य केलेले बाकीचे उर्वरित पण दिवस तुमचेच येतात हे नक्की.  असो हा विषयच न संपणारा विषय आहे.तेव्हा तुर्तास आजच्यासाठी येथेच थांबते.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “स्थळ…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “स्थळ…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

आपली आवड,आपला कल हे आपले कुटुंबीय,आपली जवळची माणसं आणि आपल्याला पुरेपुर जाणून असणारी आपली मित्रमंडळी हे अगदी नस पकडल्या सारखं जाणतात. ही सगळी आपली माणसं अगदी मनकवडीच असतात असं म्हंटलं तरी चालेल. त्यामुळेच माझी एक आवड म्हणजे भिन्न भिन्न भाषेतील,निरनिराळ्या कलाकारांनी कामं केलेल्या दर्जेदार शाँर्टफिल्म्स बघणे हे जाणून माझी मैत्रीण मधुर कुळकर्णी हीने मला एका शाँर्टफिल्म चे नाव सुचविले. त्या  मराठी शाँर्टफिल्म चे नाव  “शंभरावं स्थळ”.

त्या नावामधील “स्थळ” हा शब्द आमच्या पिढीपर्यंत तरी अगदी परिचीत आणि नवीन पिढीमध्ये “ठरवून लग्नं” यानेकी “अरेंज्ड मँरेज” करणाऱ्या लग्नाळू उपवर मुलामुलींना थोडाफार फँमिलीअर म्हणजे ओळखीचा.

आमच्या पिढीपर्यंत सरसकट अरेंज्ड मँरेज आणि स्पेशल केस म्हणून तुरळक लव्हमँरेज असा रेशो होता. आता रेशो तोच कायम आहे फक्त बाजूंची अदलाबदल झालीयं. आता लव्हमँरेज सरसकट आणि ठरवून लग्न तुरळक असं बघायला मिळतं, कालाय तस्मै नमः, असो.

आमच्या वेळी होत असलेले ते टिपीकल दाखवण्याचे कार्यक्रम, संपूर्ण माहिती असतांना पण त्याबद्दलच ती अगदी ठराविक प्रकारची प्रश्नोत्तरे हे सगळं बघून, अनुभवून प्रकर्षाने जाणवायचं, खरचं इतक्या जुजबी ओळखीवर दोघही हा भलामोठा संसाराचा डाव मांडतोयं खरा,पण खरचं होतील का हे संसार यशस्वी ? 

मग मनात यायचं खरंच ओळखीतून किंवा परिचयातून, एकमेकांना जाणून घेऊन तसेच आचारविचार ह्यांची देवाणघेवाण करुन मग मात्र नक्कीच  संसार यशस्वी होत असतील. पण ज्यांना अरेंज्ड मँरेज करायचेयं त्यांच्या साठी ह्या “कांदेपोहे”कार्यक्रमाशिवाय पर्यायही नव्हता,वा नाही.

जसाजसा काळ बदलला,पिढी खूप जागरुक, स्वतंत्र विचारांची घडायला लागली,तेव्हा मग ठरवून लग्न करतांना काही जास्तीच्या पाय-या जोडल्या गेल्या. त्यात मग मुलामुलींना एकमेकांशी बोलतांना स्पेस,प्रायव्हसी देणं हे प्रकार सुरू झालेत. हे बघितल्यावर असं वाटलं आता नक्कीच असे विचारविनमयांची चर्चा, देवाणघेवाण झाल्यावर परस्परांना नक्कीच एकमेकांचा पूरेपूर अंदाज येऊन मग हा संसाराचा पाया भक्कम उभा राहून सगळीकडे “आनंदी आनंद घडे” हे वातावरण राहील. पण हा अंदाज ही सपशेल चुकला असे काहीसे अनुभव आलेत कारण कितीही स्पेस, प्रायव्हसी मिळाल्यानंतरही चर्चा, विचारविनिमय ह्यांत फक्त स्वतःकडील व्हाईट साईड वा उजवी बाजू ही फक्त प्रत्यक्षात समोरच्याला दाखविली जाते. नंतर प्रत्यक्ष संसार सुरू झाल्यावर मात्र ह्या दोघांमधील डार्क साईड सामोरी येते,जी त्यांना आता नव्याने कळते. आणि मग संसार हा बहरु लागण्याऐवजी ईगोपाँईंटजवळ येऊन हळूहळू कोमेजायला लागतो.

शेवटी मग एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली लग्न हे ठरवून करा की लव्हमँरेज ,हे यशस्वी करण्याचा एक प्रमुख मार्ग म्हणजे तडजोड. कदाचित तडजोडीचे दुसरे नावं संसार असं म्हंटले तरी चालेल. आता फक्त ही जुजबी तडजोड करतांना फक्त दोघांनीही मनात आणायचं, हे आपणं आपल्या जीवाभावाच्या, प्रेमाच्या माणसासाठी करतोय, बस मग पुढे सगळं सुरळीत होतंच. फक्त ह्या तडजोडी जुजबी बाबतीत हव्यात, कारण एकदम पराकोटीच्या तडजोडी दोघांपैकी कुणी करु शकत नाही, आणि खरतरं स्वत्व गमावून तडजोड करुन जगण्यात मजाही नसते.

आता पुढे ह्या शाँर्टफिल्म विषयी पण नक्की लिहेनच. पण नुसतं शाँर्टफिल्म चे नाव वाचले आणि हे विचार भराभर डोक्यातून, मनातून उतरले आणि शब्द बनून बसले.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कालाय तस्मै नमः ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ कालाय तस्मै नमः ☆ श्री अरविंद लिमये ☆

‘मग्न’ हा सकारात्मकतेच्या शिडकाव्यांनी बहरून येणारा अर्थपूर्ण शब्द आहे असं म्हटलं तर ते अतिशयोक्तिचं  होणार नाही ‘ याच्याशी मी अगदी परवा परवापर्यंत तरी नक्कीच पूर्णतः सहमत झालो असतो पण आज नाही. कारण नुकतीच घडलेली एक दुर्घटना या समजाला परस्पर छेद देऊन गेलीय आणि म्हणूनच मग्नतेचं ते अकल्पित विद्रूप मला विचार करायला प्रवृत्त करतेय.

लहान मुलं खेळात रममाण होत असतात, वाचनाची आवड असणारे वाचनात गर्क होतात, एखादा आळशी माणूसमुध्दा त्याच्या आवडीचं काम मात्र नेहमीच तन्मयतेने करीत असतो, काहीतरी निमित्त होतं आणि मनात निर्माण येणाऱ्या उलट सुलट विचारांमुळे आपण विचारमग्न होऊन जातो, नामस्मरण करताना साधक तद्रूप होतं असतो, गायक गाताना तसंच श्रोते त्याचं गाणं ऐकताना अगदी तल्लीन होऊन देहभान विसरुन जातात,कोणतेही काम मनापासून करणारे त्यांच्या कामात क्षणार्धात गढून जातात. या प्रत्येकाच्या बाबतीत त्या त्या वेळी वेळेचे भान नसणे, तहानभूक विसरणे हे ओघाने येतेच. इथे वर उल्लेखलेली रममाण, गर्क, तन्मय, विचारमग्न, तद्रूप   तल्लीन, देहभान विसरणे,  वेळेचे भान नसणे, तहानभूक विसरणे गढून जाणे ही सगळी शब्दरूपे म्हणजेच मग्न या शब्दाचीच

विविधरंगी अर्थरुपे आहेत ! निमग्न, तदाकार, धुंद, चूर, एकरूप, गढलेला, मश्गूल, व्यग्र,समाधिस्थ, ही सुध्दा मग्नतेची सख्खी भावंडेच!

मग्न या शब्दात अशी विशुद्ध सकारात्मकताच ठासून भरलेली आहे याबाबत एरवी दुमत असायचं काही कारणच नव्हतं. पण नुकत्याच घडलेल्या एका घटनेने मग्न या शब्दातली सकारात्मकता कांही अंशी का होईना प्रदूषित केलेली आहे असेच मला वाटू लागलेय.

‘गरज ही शोधाची जननी आहे ‘ असं म्हणतात. विज्ञानाच्या मदतीने लावले गेलेले विविध शोध हे गरजेच्या पूर्ततेसाठीच असले तरी त्यांचा वापर गरजेपुरताच करायची गरज मात्र सर्रास दुर्लक्षिलीच जात असते. नित्योपयोगी उपकरणे असोत वा करमणुकीची साधने कुणीच याला अपवाद नाहीत. तत्पर प्रसारासाठी शोधलं गेलेलं मोबाईलतंत्र हे याचे प्रतिनिधिक उदाहरण!

मोबाईलचा अतिरेकी वापर करताना बहुतांशी सर्वांनाच ताळतंत्र राहिलेलं नाही हेच खरे.विशेषत: कानाला इअरपाॅड लावून मोबाईल ऐकण्यात मग्न होत भरधाव वाहने चालवणारे नकळतपणे जसे स्वतःचा जीव पणाला लावत असतात तसेच इतरांचा जीव जायलाही निमित्त ठरत असतात. पण याची जाणीव नसणे हे ठेच लागल्यानंतरही न येणाऱ्या शहाणपणा सारखेच असते.

अशी एखादी दुर्घटना आपल्या परिचितांपैकी कुणाच्यातरी बाबतीत घडते तेव्हाच आपल्याला त्याची झळ तीव्रतेने जाणवते याला मीही अपवाद नव्हतोच. मिरजेला रहाणारे माझे एक भाचेजावई. निवृत्तीनंतरचं कृतार्थ आयुष्य समाधानाने जगणारे. निवृत्तीनंतरही स्वतःची जमीन आवड म्हणून स्वतः कसणारे.ते एक दिवस नेहमीप्रमाणे पहाटे फिरायला म्हणून बाहेर पडले. परतीच्या वाटेवर असताना नुकतेच उजाडलेले.रहदारीही तुरळक.ते रस्त्याच्या कडेने शांतपणे चालत असताना मोबाईलवर बोलण्यात मग्न असणाऱ्या एका मोटारसायकलस्वाराने त्यांना मागून धडक देऊन उडवले.अंगाखाली दडपल्या गेलेल्या डाव्या हाताच्या कोपराच्या हाडाचे फ्रॅक्चर आणि जबरदस्त मुका मार यामुळे ते अडीच-तीन महिने जायबंदी होते.त्यांची विचारपूस करायला त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांची केविलवाणी अस्वस्था पाहून मी अस्वस्थ झालो.’नशीब डाव्या हाताचे कोपर फ्रॅक्चर झालेय,तो उजवा हात असता तर माझं कांही खरं नव्हतं’ हे स्वतःचं दुःख विसरून हसत बोलणाऱ्या त्यांच्या विचारातली सकारात्मकता कौतुकास्पद वाटली खरी तरीही त्या मोटरसायकलस्वाराच्या मोबाईल मग्नतेचं काय? हा प्रश्न निरुत्तर करणाराच राहिला. यासंबंधी कायदे कितीही कडक असले तरी व्यवहारातली त्याची उपयुक्तता फारशी व्यावहारिक नसतेच. अशा घटना टाळण्यासाठी

‘कालाय तस्मै नमः’ म्हणत जे जे होईल ते ते पहात न  रहाता नको त्या गोष्टीतल्या अशा हानिकारक मग्नतेतली नकारात्मकता प्रत्येकानेच वेळीच ओळखायला हवी एवढे खरे.

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पर्यटन – एक अनुभव…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “पर्यटन – एक अनुभव…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

पर्यटन हा बहुतेकांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. मात्र पर्यटन ह्या विषयाकडे वळतांना प्रत्येक जण वेगवेगळ्या अँगल ने विचार करुन त्याची दिशा ठरवितात. काही व्यक्ती निसर्गसौंदर्याचा विचार करुन तशी स्थळं नि्डतात तर काही द-याख़ो-या,गड किल्ले ह्यामध्ये रमतात. काही देवदर्शनासाठी नवसाला पावणा-या सुप्रसिद्ध देवस्थानांची निवड करतात तर काही आपापल्या गावी असलेल्या कुलदेवतांकडे आपला मोर्चा वळवितात.

पर्यटनाला कुठेही जावं पण जेथे जाऊ तेथली इत्यंभूत माहिती,तिथला इतिहास, हवामान, भौगोलिक परिस्थिती, त्या स्थानाचे वैशिष्ट्य हे सगळं माहितीपूर्ण अभ्यासून घ्यावं.

खेदाची बाब अशी की हल्ली त्या फ़ोटो व सेल्फी ह्यांच्या अतिरेकी आवडीने आपण त्या निसर्गसौंदर्याचे, त्या स्थानाचे महत्त्व ना धड डोळ्याने टिपंत,ना मनावर बिंबवत,ना मेंदूत ठसवतं. आपल्या इंद्रियांना निकामी करुन फक्त तंत्रज्ञानावर अवलंबून असण्याची ही सवय तशी घातकच.

ह्या बाबतीत आम्ही उभयता दोघेही आणि आमचा लेक आधी सगळे डोळ्या़ंनी बघणार, हिंडून सगळं अभ्यासणार, संपूर्ण माहिती गोळा करणार आणि मग जसा वेळ उरेल तसे फोटो काढणार. आजकाल सर्रास एखाद्या स्थळी लोक पोहोचल्या पोहोचल्या आधी सेल्फी व फोटोसेशन नी मग लगेच त्या फोटोंचे सोशलमिडीया वर अपलोडींग. आजकाल सोशलमिडीया वर कुटूंबाचे वा मित्रमैत्रीणींचे फोटो टाकले तरच प्रेम वा मैत्री असं नसतं कारण सोशल मिडीयावरील फेसबुक, व्हाँटसअप हे सगळं आभासी जगं असतं. असो काही स्थळं ही आपण आयुष्यात बघायचीच असं ठरविलेल्या काही स्थळांपैकी एक कन्याकुमारी. अहो,मी आणि व्यंकटेश आम्ही तिघही कन्याकुमारी स्मारकावर पोहोचलो तो क्षण आम्हा तिघांसाठी अविस्मरणीय असा  क्षण होता. त्या स्थळाचे पावित्र्य, शांतता बघून आम्ही तिघही एकमेकांशी न बोलता स्तब्धतेनं ते सगंळ वैभव डोळ्यात साठवायला लागलो. हे सगळं आज आठवायचे कारण म्हणजे आजच्या तारखेला म्हणजे सात जानेवारी ला ह्या स्थानकाचे काम पूर्ण झाले होते.

विवेकानंद स्मारक  हे तामिळनाडूच्या कन्याकुमारी शहरात स्थित एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. 1892 मध्ये स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले. एके दिवशी ते पोहत या प्रचंड खडकावर पोहोचले. या निर्जन स्थळी साधना केल्यानंतर जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी त्यांना मार्गदर्शन लाभले होते. आणि ह्या स्थळाला परमहंस ह्यांच्या शिष्याने अजरामर केले.विवेकानंदांच्या त्या अनुभवाचा संपूर्ण जगाला फायदा झाला, कारण त्यानंतर काही वेळातच ते शिकागो परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले होते. या परिषदेत सहभागी होऊन त्यांनी भारताचे नाव उंचावले होते.

1970 मध्ये स्वामी विवेकानंदांच्या स्मृती प्रित्यर्थ  त्या प्रचंड खडकावर एक भव्य स्मारक  बांधण्यात आले. समुद्राच्या लाटांनी वेढलेल्या या खडकापर्यंत पोहोचणे हाही एक वेगळा अनुभव असतो. खळाळत येऊन त्या खडकवर आदळणा-या महाकाय लाटा बघितल्यावर परत एकदा पंचमहाभूतांचे अस्तित्व मनाला स्पर्शून गेले.

स्मारक इमारतीचा मुख्य दरवाजा अतिशय सुंदर आहे. अजिंठा-एलोरा लेण्यांतील दगडी शिल्पांची प्रकर्षाने आठवण येते. लाल रंगाच्या दगडाने बनवलेल्या या स्मारकाला 70 फूट उंच घुमट आहे.इमारतीच्या आतील बाजूस चार फुटांपेक्षा उंच व्यासपीठावर ज्ञानी,धीरगंभीर  स्वामी विवेकानंद यांची आकर्षक मूर्ती आहे. ही मूर्ती पितळेची असून, तिची उंची साडेआठ फूट आहे. ही मूर्ती इतकी प्रभावी आहे की त्यात स्वामीजींचे व्यक्तिमत्त्व जिवंत असल्याचे दिसते.जमिनीच्या किनार्‍यापासून सुमारे 500 मीटर अंतरावर समुद्रात असलेल्या दोन खडकांपैकी एकावर बांधले गेले आहे. एकनाथ रानडे यांनी विवेकानंद स्मारक मंदिर बांधण्याचे विशेष कार्य केले. एकनाथ रानडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह होते. समुद्रकिनाऱ्या पासून पन्नास फूट उंचीवर बांधलेले हे भव्य आणि प्रचंड दगडी बांधकाम जगाच्या पर्यटन नकाशावर एक महत्त्वाचे आकर्षण ठरले आहे. तेथे विवेकानंद ह्यांच्या वरीले पुस्तके, त्यांच्या स्मरणार्थ तयार केलेल्या दिनदर्शिका, डाय-या ह्यांचे दालन आहे .

स्मारक तयार करण्यासाठी समुद्रकिना-यावर असलेल्या वर्कशॉपमध्ये सुमारे 73 हजार प्रचंड दगडांचे ब्लॉक्स कलाकृतींनी सुसज्ज केले गेले आणि समुद्र मार्गाने खडकापर्यंत नेले गेले. यातील किती दगडी तुकड्यांचे वजन 13 टनांपर्यंत होते. याशिवाय स्मारकाच्या मजल्यासाठी वापरल्या जाणार्‍या दगडी ब्लॉक्सच्या आकृत्या आहेत. या स्मारकाच्या उभारणीसाठी सुमारे 650 कारागिरांनी 2081 दिवस रात्रंदिवस काम केले. या मंदिराच्या दगडी शरीराला आकार देण्यासाठी एकूण 78 लाख मानवी तास खर्ची पडले. 2 सप्टेंबर 1970 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. व्ही. तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भव्य समारंभात गिरी यांनी स्मारकाचे उद्घाटन झाले.

कन्याकुमारी बघून आल्यावर प्रकर्षाने जाणवले खरंच आपला भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. 

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ घर दोघांचे… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

?  विविधा ?

☆ घर दोघांचे… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆ 

‘परस्परांशी नाती असलेला माणसांचा समूह ‘ अशी कुटुंबाची व्याख्या केली जाते.माणसांमधली ही नाती जन्मावरून,विवाहावरून किंवा दत्तक घेण्यावरून निर्माण होतात. कुटुंब ही समाजातील सार्वभौम संस्था असली तरी स्थळकाळसापेक्ष तिच्या स्वरूपात भिन्नता आढळून येते.

कुटुंबाचे प्रकार –

१. आप्तसंबंधावर आधारित कुटुंबप्रकार –

अ.केंद्रकुटुंब: अशा प्रकारची कुटुंबे बहुधा सर्वत्र आढळतात. यात पति, पत्नी आणि त्यांची अविवाहित किंवा दत्तक मुलांचा समावेश होतो.

ब. विस्तारित कुटुंब: यात कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्त असते.प्रामुख्याने शेती व्यवसायातील कुटुंबांचा यांत समावेश होतो.

२. विवाह प्रकारावर आधारित-

अ. एक विवाही कुटुंब- एक पुरुष आणि एक स्त्री यांच्या वैवाहिक संबंधांद्वारा अशी कुटुंबे निर्माण होतात. पती आणि  पत्नी जीवंत असेपर्यंत दोघांपैकी कुणा एकाला दुसरा विवाह करता येत नाही.

ब. बहुपती कुटुंब- अनेक पुरुष एका स्त्रीबरोबर विवाह करून कुटुंब निर्माण करतात.

क. बहुपत्नी कुटुंब- यात एक पुरुष अनेक स्त्रियांसोबत विवाह करतात.

३. वंश आणि अधिसत्ता यावर आधारित-

अ. मातृसत्ताक कुटुंब: या प्रकारात कुटुंबात अधिसत्ता ही स्त्रीची असते .शिवाय कुटुंबाचा वंशही स्त्रीच्या नावाने चालला जातो.

ब.पीतृवंशीय कुटुंब: या प्रकारात कुटुंबात अधिसत्ता ही पुरुषाची असते.शिवाय कुटुंबाचा वंशही पुरुषाच्या नावाने चालतो.

४.काबीली कुटुंब: जनजातीमध्ये असलेली ही पध्दत सामाजिक विकासक्रमाच्या आदिम अवस्थेच्या जवळची आहे.

कुटुंब हा समाजशास्त्र आणि  मानसशास्त्राच्या दृष्टीने मूलभूत असा प्राथमिक गट आहे.

कुटुंबाची कार्ये-

१. प्रजनन करणे .

२. पालनपोषण करणे.

३.नव्या पिढीचे वेगवेगळ्या पध्दतींनी सामाजिकरण करणे.

४. व्यक्तीला निस्चित स्थान आणि दर्जा प्राप्त करून देणे.

वरील कार्यांपैकी प्रत्येक कार्य तत्वत:  दुसऱ्या संस्थांकडून होऊ शकते.पण आजवर तरी

कुटुंबाऐवजी दुसरी पर्यायी समाजसंस्था ही कार्ये तेवढया परिणामाने करू शकलेली नाही.

कुटुंबसंस्थेवर मुख्यत: पुढील शक्तींचे वेळोवेळी आघात होतात;

१.आर्थिक- औद्योगिकीकरण व शहरीकरण.

२.वैज्ञानिक यंत्रतंत्रशक्ति.

३.मूल्यात्मक व्यक्तिवाद किंवा समूहवाद.

४.विवाहनीतीत पूर्ण स्वातंत्र्याचा आग्रह.

हे बदल मुख्यत: पाश्चात्य समाजात होतात तरी,आपल्या समाजातील कुटुंबावरही त्याचे आघात होत आहेत. कोणत्याही प्रकारच्या कुटुंबात प्रमुख घटक पती आणि पत्नी असतात. त्यांच्या संबंधाला तडा जातो घटस्फोटामुळे.

घटस्फोट: पती आणि पत्नीचे निर्माण झालेले वैध वैवाहिक संबंध कायदेशीररीत्या संपुष्टात येणे म्हणजे घटस्फोट होय. घटस्फोटामुळे तापदायक वैवाहिक संबंधापासून फारकत घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले तरी त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात उदा.

– घटस्फोटित स्त्रीला अनेक कठीण प्रश्नांना तोंड द्यावे लागते.

– ती जर मिळवती किंवा आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण नसेल तर हे प्रश्न अधिक जटील होतात.

– घटस्फोटित स्त्रीचा पुनर्विवाह सहसा होत नाही.

– तिच्याकडे पहाण्याचा समाजाचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित असतो.

-घटस्फोटित स्त्रीला मुले असतील तर तिचा पुनर्विवाह होणे अवघड असतो.

– झालाच तरी तिच्या लग्नापूर्वीच्या मुलांना सावत्रपणाचा जाच सोसावा लागतो,अनेकांच्या स्वभावात काही दोष आढळून येतात, अनेक जण एकाकी आणि पोरकी होतात.

घटस्फोटामुळे असे प्रश्न केवळ स्त्रियांतच दिसतात असे नाही तर पुरुषांमध्येही अनेक समस्या दिसून येतात. अनेक आर्थिक,मानसिक, सामाजिक आणि लैंगिक समस्या निर्माण होतात, घटस्फोटित व्यक्तिविषयी समाजाचा दृष्टिकोन चांगला नसतो.याशिवाय मुलांची कस्टडी आणि मालमत्तेचे प्रश्न निर्माण होतात.

घटस्फोटाची दिसून येणारी कारणे :

-पुरुष किंवा स्त्रीचे विवाहपूर्व संबंध नंतर उघडकीस येणे.

– विवाहानंतर विवाहबाह्य संबंध.

– परस्परांची होणारी भांडणे,उडणारे खटके.

-व्यसने, जुगार.

– भावनिक छळ,अत्याचार.

– दोघांतील पुढीलपैकी फरक ;

– वय, भाषा,चालीरिती, आवडीनिवडी, छंद, खाण्यापिण्याच्या सवयी,भौगोलिक बाबी,उत्पन्नाची साधने,दोघांतील विवाहापूर्वीची अनेक बाबतीतील तफावत इ.

अनेकदा विवाहापूर्वी हवाहवासा होणारा सहवास विवाहानंतर नकोसा वाटतो परस्परांबद्दलच्या प्रेमाची जागा घृणा, तिटकारा घेते.अनेकदा संयुक्त कुटुंबातील मतभेद याला कारणीभूत ठरतात. परस्परांमधील दरी दिवसेंदिवस  वाढतच जाते. एकमेकांतील दोष दिसू लागतात, आपण कसे डावललो जातो,आपल्याला कशी किंमत दिली जात नाही हे ते सतत बोलत जातात. समाजातील आपली प्रतिमा कशी असेल आणि आपले कुटुंब म्हणून ऐक्य याची तमा न बाळगता ते  एकमेकांची उणीदुणी काढण्यातच धन्यता मानतात.

हे नक्कीच चिंतेचे असते.

याला जबाबदार कोण? या प्रश्नावर एकच एक उत्तर देता येणार नाही.कुटुंबनिहाय यात वेगवेगळेपणा असतो.

घटस्फोटाच्या वर दिलेल्या कारणांव्यतिरिक्त पुढील बाबींचाही गांभीर्याने विचार करावा लागेल;

– अनेक ठिकाणी कुणी एकजण याला जबाबदार नसतो.परिस्थिती त्यांना हे करण्याला भाग पाडते

– विवाह टिकवणे हे अनेकदा अशक्य बनते.पण कधी कधी परस्परांना समजून न घेणे किंवा गृहीत धरणे हेही एक कारण असते.

-अनेकदा एक घटक आपला कोणत्यातरी बाबतीतचा हेका  सोडत नाही.आणि ते घटस्फोटाचे कारण बनते.

-कुटुंबात व्यक्तिस्वातंत्र्याला  महत्त्व असलेच पाहिजे.मात्र त्यासोबतच कुटुंबसंस्थेच्या महत्त्वाचीही जाणीव असलीच पाहिजे.

जगात भारताची ओळख ही भक्कम कुटुंबसंस्था असणारी संस्कृती अशी आहे.कुटुंबात कुणा एकावर अन्याय न होताही सर्वांच्या हिताच्या दृष्टीने आणि समाजस्वास्थाच्या साठीही कुटुंबातील पतीपत्नींनी व्यक्तिस्वातंत्र्य,

स्वाभिमान याचा विचार करतानाच परस्परांशी सतत संवाद साधत राहीले पाहिजे.परस्परांविषयी गैरसमज हे आपापसात बोलूनच नाहीसे केले पाहिजे.

पती आणि पत्नी ही संसाराच्या गाडीची दोन चाके असतात असे समजले जाते.ही दोन्ही चाके (सामाजिक दर्जा,व्यक्तिस्वातंत्र्य या अर्थाने) समान आकाराची असलीच पाहीजे.गाडी चालताना या दोहोंत ठराविक अंतर असावे.मात्र या त्यांना सतत  विश्वासाचे वंगण दिले पाहिजे.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

ईमेल- [email protected]

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मकर संक्रांत…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “मकर संक्रांत…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

इंग्रजी नवीन वर्ष सुरू झाले की पहिला  येणारा सण म्हणजे मकरसंक्रांत. कुणाच्याही मनात घर करायचं असेल तर त्याचा रस्ता हा आपल्या वाणीमार्फत जातो.तुमच्या वाणीवरच तुमच्याशी जोडल्या गेलेली माणसं ही जुळून राहतात की दुरावतात हे संपूर्णपणे अवलंबून असतं.म्हणून ह्या सणाचा मूलमंत्रच मुळी “तिळगूळ घ्या आणि गोडगोड बोला”असा आहे. ह्या सणाद्वारे गैरसमजाने निर्माण झालेले मनमुटाव,नाराजी क्षणात दूर होऊन निरभ्र आकाशासारखं मनं स्वच्छ होतं. अर्थातच” गोड बोला” हे शब्द अगदी स्वच्छ पारदर्शी मनातून आणि मनापासून सुद्धा उमटले तरच त्याला अर्थ आहे.

पुराणात मकरसंक्रांतीची अशी कथा सांगतात की, संकरासूर नावाच्या राक्षसाला जगदंबेने या दिवशी मारले म्हणून तिला संक्रांतीदेवी असे म्हटले जाऊ लागले.

…हा सण साजरा करण्याच्या पद्धती ह्या प्रांतानुरूप थोड्या बदलतात.मकर संक्रांतीच्या दिवशी समृद्धीचे प्रतीक म्हणून सुगड्यांची पूजा केली जाते. या सुगड्यांना दोरा गुंडाळतात.. त्यानंतर हळद-कुंकू लावून त्यामध्ये ऊसाचे काप टाकले जातात, त्याबरोबरच तीळ गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, बोरं टाकली जातात. यानंतर एका शुभ्र वस्त्राने कपडे झाकून प्रार्थना केली जाते. ही पूजा आटोपल्यानंतर गृहिणी आपल्या सवडीप्रमाणे एकमेकींना भेटण्यासाठी जातात. तीळ गुळ देऊन छोट्या भेटवस्तू देऊन हा सण साजरा करतात. या भेटवस्तूंना वाण देणे म्हणते. नवविवाहित जोडप्याचा दोन्ही घरी संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करतात. एरवी आपण काळा रंग अशुभ मानतो परंतु ह्या संक्रांतीच्या सणाला काळ्या वस्त्रांच महत्त्व असतात त्यामुळे बाजारात ह्या दिवसात काळ्या साड्या व काळे पंजाबी ड्रेसेस खप असल्या कारणाने भरपूर बघायला मिळतात.

मकरसंक्रांतीला उत्तरायण सुरू होते. उत्तरायण हा शुभ काल मानला जातो. याबद्दल अशी गोष्ट आहे की, महाभारतातील कौरव –  पांडवांचे युद्ध चालू होते. अर्जुन भीष्मांशी लढत होता पण ते त्याला जड जात होते. तेव्हा श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून अर्जुनाने शिखंडी ला पुढे उभे केले आणि तो त्याच्याआडून लढू लागला. शिखंडी हा अगोदर अंबा नावाची राजकन्या होता. भीष्मांनी आपल्या सावत्र भावासाठी अंबा, अंबिका व अंबालिका अशा तीन राजकन्या पळवून आणल्या होत्या.

अंबेचे दुसर्‍या राजावर प्रेम होते म्हणून भीष्मांनी तिला त्याच्याकडे पाठवले; पण पळवून नेलेल्या मुलीचा स्वीकार करायला त्याने नकार दिला. ज्या भीष्मांमुळे हे सारे झाले त्यांचा सूड घेण्याचे अंबेने ठरवले. ती तपश्चर्या करून शिखंडी नावाचा पुरुष झाली आणि भीष्मांशी लढायला आली. पण ती पूर्वी स्त्री होती म्हणून भीष्म शिखंडीशी लढेनात. तेव्हा अर्जुनाने शिखंडीच्या आडून सोडलेल्या बाणांनी जखमी होऊन भीष्म कोसळले. त्यांच्या अंगामध्ये इतके बाण घुसले होते की, ते जमिनीवर खाली न पडता बाणांच्याच गादीवर आडवे झाले. तेव्हा दक्षिणायन सुरू होते. पण भीष्म इच्छामरणी होते म्हणून त्यांनी उत्तरायणाचा शुभ काल सुरू होण्याची वाट पाहिली आणि मगच प्राण सोडले.

अशा ह्या स्नेहबंधाचे धागे गुंफणा-या सणाची महती सांगणारी माझी एक रचना  पुढीलप्रमाणे

मकरसंक्रांतीची शिकवण

ह्या सणाला काय महत्त्व सांगतो काटेरी हलवा

तीळ गुळासंगे मुखी ठेऊनी राग मनीचा घालवा

ह्याला काय महत्त्व सांगतात ती आंबटगोड बोरं

मनातील किल्मिष पूर्ण घालवा मनं करा कोरं

ह्याला काय महत्त्व सांगतात गोड ऊसाचे कांडे

गोड बोलून टाळावे जरी लागले भांड्याला भांडे

ह्या सणाला काय महत्त्व सांगतो टप्पोरा तीळ

आढ्यता आता सोडा घालवा मनातील पीळ

ह्याला काय महत्त्व सांगतो पिवळाधम्म गूळ

स्वच्छ निरभ्र करा मनं सोडून गैरसमजाचे खूळ

ह्याला काय महत्त्व सांगते मिश्रडाळीची खिचडी

फटकळ तोंडाळपणा पेक्षा बरी ती लाडीगोडी

काय महत्त्व सांगतात ती लालचुटुक गाजरं,

मनात शिरूर राह्यलं की आयुष्य होतं साजरं

द्वेष आता सोडा माणसं आता  जोडा ,

तीळगूळ घेऊन गोड बोलून गाठ मनीची सोडा.,

गाठ मनीची सोडा…

परत एकदा तीळगूळ घ्या अन् गोडगोड बोला. मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – शकुनी महिला मंडळ ! – ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 😂 चं म त ग ! 🎲 शकुनी महिला मंडळ ! 💃☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

चाळीतले “शकुनी” महिला मंडळ सकाळची काम आटपून, रोजच्या प्रमाणे दुपारी जिन्या जवळच्या मोकळ्या चौकात, चाळगोष्टी करायला जमले होते.  प्रत्येकीच्या हातात काही ना काही निवड, टिपण, शिवण (स्वतःच्या घरचे) होतेच ! आता तुम्ही म्हणाल “शकुनी” महिला मंडळ म्हणजे ? शकुनी तर कपटी पुरुष होता आणि महिला मंडळाला “शकुनी” महिला मंडळ हे नांव कसे काय पडले ? मी तुम्हाला शकुनीच्या फाशांची शपथ घेवून सांगतो, की महिला मंडळाला हे असे नांव ठेवण्यात माझा फाशां प्रमाणे त्याच्या पटाचाही संबंध नाही ! पण तुमचा प्रश्न रास्तच आहे आणि त्याचे उत्तर ऐकून तुम्हाला धक्का बसण्याचा पण संभव आहे !  त्या महिला मंडळाला असे नांव सर्वानुमते त्यांच्याच मुला मुलींनी दिले होते, आता बोला !  त्या सगळ्यांनीच सध्या टीव्ही वर चालू असलेले महाभारत बघून त्यात दाखवलेल्या शकुनीच्या द्यूतामुळे महाभारताचे रामायण घडले, अशी आपल्या बाल मनांची समजूत करून घेतली असावी ! त्यामुळे चाळीत आपापल्या आयांमुळं, अगदी महाभारत होत नसले,  तरी कायम शीतयुद्ध सुरूच असते,  या समजुतीतून त्यांनी हे नांव महिला मंडळाला दिल्याची शक्यता नाकारता येत नाही !

तशी “शकुनी” महिला मंडळाची सभासद संख्या जरी जास्त असली, तरी यंग टर्क्सच्या मते त्यांच्या पैकी शहाणे, कुलकर्णी आणि निफाडकर काकू, चाळीतल्या आतल्या बातम्या काढण्यात जेम्स बॉण्डवर मात करतील अशा ! त्यामुळे त्या तिघींच्या आडनावाचे आद्याक्षर वापरून “शकुनी” हे नांव त्यांनी मंडळाला बहाल केले होते असे पण काही लोक म्हणतात !

आज जरा बऱ्या पैकी ऑडियन्स जमलेला बघून जोशीणीने पहिला फासा टाकला !  “तळ मजल्यावरची चितळ्यांची नलू बहुतेक पळून गेली वाटत !” हे ऐकताच सगळ्या महिला मंडळाचे हात, जे काही निवड,  टिपण करत होते, ते एकदमच कोणीतरी स्टॅचू केल्यागत थिजल्या सारखे झाले ! पण स्वतः जोशीण मात्र काहीच झालं नाही अशा अविर्भावात पुन्हा तांदूळ निवडायला लागली.  हा धक्का पचवायला सकल महिला मंडळाला साधारण सारखाच वेळ लागला आणि सगळ्यांनी एकदमच बोलायला सुरवात केली.  “काय सांगतेस काय? कुणाबरोबर गं?” “माझा तर बाई विश्वासच बसत नाहीये” “नेहमी खाली मान घालून जाणारी, साधी राहणारी असं काही…. ” “हो ना, तिच्या वयाच्या मुली नको नको ती फॅशन करत असतांना, ही अजून साडीत…. ” “म्हणजे अगदी खाली मुंडी पातळ धुंडी निघाली…. ” तो गलका ऐकून जोशी काकू म्हणाल्या “माझं जरा ऐका, मी म्हटलं ‘चितळ्यांची नलू बहुतेक पळून गेली !’ अजून तशी खात्रीलाय बातमी यायची…. ” तिला मधेच तोडत साने काकू म्हणाल्या “म्हणजे अजून तुला नक्की माहित नाही, तर कशाला उगाच तीच नांव खराब करतेस ? अशांन तीच लग्नतरी होईल का ?” यावर साठे काकूंनी पण जोशी काकुंवरचा आपला राग व्यक्त केला आणि म्हणाल्या “तुला ना त्या टीव्ही वरच्या बातम्या देणाऱ्यांसारखी घाई असते, बघा आमच्याच चॅनेलने ही बातमी प्रथम तुमच्या पर्यंत आणली….”  तेवढ्याच ठसक्यात जोशीण म्हणाली “अग बरेच दिवसात दिसली नाही म्हणून म्हटलं पळून गेली की काय, कारण तीच्या प्रेम

प्रकरणाची बातमी तूच तर  आम्हाला दिली होतीस !” हे ऐकताच साठे काकू परत खाली मान घालून गहू निवडायला लागल्या. ते बघून जोशीणीला मनोमन आनंद झाला आणि तिने आपला मोर्चा साने काकूंकडे वळवला “आणि साने काकू लग्न न व्हायला काय झालंय नलूच,  हिरा कितीही लपवला तरी चमकायचा राहतो का ?” हे ऐकताच सावंत काकू म्हणाल्या “आता ही हिरा कोण ?” त्यांच हे बोलण ऐकून मंडळात एक हास्याची लहर उठली.  सावंत काकूना काही कळेना, पण आपल्या प्रश्नाचे कोणीच उत्तर देत नाहीत हे बघितल्यावर त्या पुन्हा हातातली गोधडी शिवायला लागल्या.

त्या हास्य लहरीत वातावरण थोडं निवळत असतानांच, हातात दोन मेथीच्या जुड्या घेवून स्वतः चितळे काकू हजर ! त्यांना पाहताच जणू काहीच झाले नाही, या थाटात साने काकू त्यांना म्हणाल्या “छान दिसत्ये मेथी, कुठून आणलीस गं ?” “अग यांच्या ओळखीचा एक भाजीवाला आहे नाशिकचा, त्याच्या कडून हे घेवून आले !” “पुढच्या वेळेस मला पण दोन जुड्या सांग हं, आमच्यकडे पण मेथी फार आवडते सगळ्यांना.” “हो सांगीन ना, त्यात काय एवढं आणि हो आणखी कोणाकोणाला हवी असेल तर आत्ताच सांगा म्हणजे एकदम आणायला बरी.” मग प्रत्येकीनं आपआपली ऑर्डर दिली पण जोशीण काही बोलायला तयार नव्हती.

ते बघून साठीणीला पण चेव आला आणि ती मुद्दामच तिला म्हणते कशी “काय गं, तुला नको का नाशिकची मेथी ?” “नको हो, आमच्याकडे माझ्याशिवाय कोणीच खात नाही.  पण तुम्ही एक कामं करा, तुम्ही भाजी केलीत की द्या वाटीभर पाठवून, कडू असली तरी गोड मानून खाईन हो !” हे ऐकताच साठीणीचा चेहरा पाहण्या सारखा झाला.  पण ती खमकी तशी जोशीणीची पाठ सोडायला तयार नव्हती. वरकरणी हसत म्हणाली “हो देईन की त्यात काय एवढं !” पण मनांतून जोशीणीच्या बातमीची खात्री करायला, स्वतः चितळे काकू हजर असल्याचा फायदा घेण्याचे ठरवून, तिने जोशीणीकडे पहात चितळे काकूंना डायरेक्ट सवाल केला, “काय हो काकू, हल्ली तुमची नलू दिसली नाही बरेच दिवसात. तब्बेत वगैरे बरी आहे ना तिची ?” “हो अगदी मजेत आहे, तिला काय होतंय !” “तसं नाही पण जोशी काकू म्हणत होत्या….. ” साठीणीला मधेच थांबवत जोशीण म्हणाली “हो बरेच दिवसात दिसली नाही ना,  म्हणून जरा काळजी पोटी विचारत होते की नलूला कुणी बघितलीत का !” जोशी काकूंच्या या बोलण्यावर साठे काकूंनी बोलायला तोंड उघडले, पण त्या आधीच चितळीण बोलती झाली, “नाही तुमच सगळ्यांचे म्हणणे बरोबरच आहे, पण तिची तब्येत अगदी ठणठणीत आहे, काळजी करायच काहीच कारण नाही.” “ते चांगलंच आहे, पण चाळीत कुठे दिसली नाही…. ” “अहो साठे काकू ती घरात असेल तर दिसेल ना?” “म्हणजे मग आम्ही जे ऐकलं ते खरच…” “हो खरच आहे ते,  ती सध्या ओबेरॉय मध्ये  राहते आहे !” “म्हणजे ?” “अहो ती गेल्याच महिन्यात US वरून आली आणि सेल्फ क्वारंटाईन साठी म्हणून एअरपोर्ट वरून डायरेक्ट ओबेरॉयला अठ्ठावीस दिवसासाठी !”  चितळे काकूंचे बोलणे ऐकून तमाम महिला मंडळ जोशीणीकडे खाऊ का गिळू नजरेने बघायला लागले आणि जोशीण खाली मान घालून परत तांदूळ निवडायला लागली.  आणि एकीकडे  मंडळाच्या तीन आधारस्तंभानी म्हणजे शहाणे, कुलकर्णी आणि निफाडकर काकूंनी सुटकेचा निश्वास टाकला !

© श्री प्रमोद वामन वर्तक

१७-०१-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares