मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग – ५२ – डेट्रॉईट आणि वृत्तपत्रातील वादळ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग –५२ – डेट्रॉईट आणि वृत्तपत्रातील वादळ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

मेंफिसहून स्वामीजी शिकागोला परतले. २५ जानेवारीला, तिथेही एक कार्यक्रम झाला. तीन आठवडे राहून ते आता डेट्रॉईट ला आले होते. सांस्कृतिक शहर होतं डेट्रॉईट. तिथे सतत काही न काही घडत तरी असे, किंवा काही तरी उपक्रम चालत असे. असे नवचैतन्य असलेले शहर, इथे नवीन उपक्रमाचे नेहमी स्वागत होत असे,स्वामींचा तिथे तीन वेळा मुक्काम झाला. त्या काळात त्यांची ८ सार्वजनिक व्याख्याने झाली.

डेट्रॉईट मध्ये स्वामीजी मिसेस जे.बॅगले यांच्या राजेशाही प्रासादात मुक्कामाला होते.

बॅगले साठीच्या होत्या. स्वतंत्र विचारांच्या, तडफदार आणि मनाने उदार होत्या. त्यांचे पती मिशिगन चे निवृत्त गव्हर्नर होते ,पण दुर्दैवाने त्यांचे खूप लवकर निधन झाले. व्यापक दृष्टी असलेल्या बॅगले अनेक सार्वजनिक कामात विविध ठिकाणी पदांवर होत्या. जबाबदारी सांभाळत होत्या. शिकागो चे जे प्रदर्शन भरले होते त्याच्या महिला विभागाच्या व्यवस्थापक मंडळावर त्या होत्या. सर्व धर्म परिषदेत त्यांनी विवेकानंदांची भाषणे ऐकली होती. तेंव्हाच त्यांच्यावर स्वामीजींचा प्रभाव पडला होता. त्यामुळे तर काय त्यांनी स्वामीजींना अगदी आनंदाने डेट्रॉईटला आपल्याकडे ठेऊन घेतले होते.

स्वामीजींच्या स्वागताप्रीत्यर्थ अल्पोपाहाराचा खास कार्यक्रम आयोजित केला होता.त्याला सर्व चर्च चे बिश्यप, धर्मोपदेशक, महापौर,पत्रकार, प्राध्यापक, विचारवंत अशा सर्वांना निमंत्रित केलं होतं. याआधी सुद्धा बॅगले यांनी नामवंतांसाठी असे कार्यक्रम आयोजित केले होते पण त्याहीपेक्षा हा कार्यक्रम चांगला झाला असे वृत्तपत्रातल्या प्रसिद्धीत म्हटले होते.

पण या सुंदर नियोजित कार्यक्रमाला गालबोट लागले ते तिथे आलेल्या एका स्त्रीने स्वामीजींना उद्देशून अपमानकारक काही शब्द वापरले होते म्हणून. ते बॅगले यांना अजिबात आवडले नाही. ही तर स्वामीजींना विरोधाची नांदी च ठरली होती जणू. वाचकांच्या पत्रात वृत्तपत्रात हे छापून आले होते. दुसर्‍या दिवशी फ्री प्रेस च्या पत्रकारांनी घेतलेली त्यांची मुलाखत छापताना सुरुवातीलाच काही उपहासात्मक चार ओळी सुद्धा लिहिल्या होत्या मुलाखतित मेंफिस ला प्रश्न विचारले होते तसेच विचारले होते. ही मुलाखत डेट्रॉईट इव्हिंनिंग न्यूज मध्ये सविस्तर छापली होती.

डेट्रॉईटच्या युनिटेरियन चर्च मध्ये स्वामीजींचे पहिले व्याख्यान झाले. मिसेस मेरी फंकी या वेळी उपस्थित होत्या. 

स्वामी विवेकानंद, भारतातील अध्यात्मिकता गुलामगिरीत सुद्धा टिकून राहिली होती,ती प्राचीन संस्कृती, खोलवर पोहोचलेली नीतीमूल्य यावर स्वामीजी बोलले. अशा आमच्या देशात ख्रिस्ती उपदेशकांची काहीही आवश्यकता नाही ,त्यांनी हवं तर भारतात यावं आणि तिथल्या संस्कृतीकडून धडे घ्यावेत”.झालं! ही टीका सहन न होऊन स्वामीजींच्या याच मुद्दयाचा आधार घेऊन आता विवेकानंदांविरूद्ध टीका सुरू झाली.विवेकानंद यांच्या आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक करायला सुद्धा आता लोक नाही म्हणू लागले. आणि आता विवेकानंद आपले पाहुणे नाहीत सर्वधर्म परिषद आता संपली आहे. आपण त्यांच्या बोलण्यावर जोरदार प्रहार केला पाहिजे. मिशनर्‍यांनी उठवलेले हे वादळ ट्रिब्युन जर्नल, इव्हिंनिंग न्यूज, फ्री प्रेस या तिथल्या प्रमुख वृत्तपत्रातून आल्याने आता स्वामीजी एका बाजूला तर मिशनरी एका बाजूला अशी स्थिति निर्माण झाली.

डेट्रॉईट मध्ये तर वृत्तपत्रात वाचकांची पत्रे आणि संपादकीय याचा वर्षाव झाला जणू. स्वामीजींचे दुसरे व्याख्यान हिंदूंचा तत्वज्ञानविचार या विषयावर झाले.काहीजण योग्य विचार करून स्वामीजींबद्दल लिहिणारे होते तेही छापून येत होते.

विवेकानंद यांना सभेनंतर प्रश्न विचारत किंवा प्रश्नोत्तरचा कार्यक्रम होई त्यात विचारत. त्यातील मते अशी असत. “भारत एक अतिशय मागासलेला देश आहे. आदिम समाज असावा तसा किंवा त्या अवस्थेतून नुकताच बाहेर पडत असलेला देश. दगड धोंड्यांची तसेच, वड किंवा तुळस अशा झाडांची, नाग, वानर अशा प्राण्यांची, पुजा तेथे चालते.पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीला सरळ त्याच्या बरोबर चितेवर चढवतात . तेथील लोक आपली मुले विशेषत मुली गंगेत सुसरीपुढे टाकतात किंवा जगन्नाथाच्या रथयात्रेवेळी चाकाखाली आपले शरीर झोकून देऊन अनेक जण प्राणत्याग करतात”. अशा तिथे भारताबद्दल समजुती होत्या. हेच प्रश्न लोक तिथे विचारात असत. विवेकानंद यांनी या सर्व प्रश्नांना वेगवेगळ्या कार्यक्रमात ,मुलाखतीत,सभेच्या शेवटी योग्य ती सत्य उत्तरे दिली. नेमके त्या मागचे विचार आणि वस्तुस्थिती स्पष्टपणे समजावून सांगितली.काहीही लपविले नाही.

त्या लोकांची दुसरी समजूत अशी होती, ‘भारतात चमत्कार करणारे काही फकीर आणि बैरागी आहेत, ते आकाशात दोर ताठ फेकून त्यावर चढून नाहीसे होतात. पुन्हा खाली येतात. आपले शरीर जमिनीपासून वर अधांतरी उचलतात,पाण्यावरून चालत जातात, हिमालयात तर अनेक योगी व महात्मे असे आहेत की, अनेक दिवस अन्न पाण्याशिवाय राहू शकतात. भूत भविष्य सांगतात. निसर्गाचा कोणताही नियम त्यांना अडवू शकत नाही. शंभर शंभर वर्षे जगतात’ अशा या समजुतीचे विवेकानंद यांनी स्पष्ट नकारार्थी उत्तर दिले. काही वेळा क्वचित चमत्कार घडतात पण त्यामागे काही नियम असला पाहिजे तो आपल्याला माहिती नसतो एव्हढच. आपण हिमालयात फिरलेलो आहोत. असा कुठलाही महात्मा आपल्याला भेटलेला नाही असे ठणकाऊन सांगितले. पुढे जाऊन असेही स्पष्ट केले की, हिंदू धर्मातील तत्वज्ञानामध्ये चमत्कारांना कोणतेही महत्व दिलेले नाही. सामान्य माणूस त्यांना भुलतो. पण ते त्याचे अज्ञान असते. आध्यात्मिक धारणा महत्वाची आहे. आणि तिचा संबंध माणसाच्या आत्मिक विकासाशी आणि विशुद्ध आचरणाशी आहे. ही भारतीय तत्वज्ञानाची शिकवणूक आहे. हे स्वामी विवेकानंद यांचे बुद्धिनिष्ठ विचार थिओसॉफीच्या विचारसरणीचा पाया च डळमळीत करणारे ठरले आणि पुन्हा एकदा त्यांना शत्रुत्व पत्करावे लागले.एव्हढी समाधानकारक उत्तरे त्यांनी दिली होती, तरी सुद्धा यानंतरच्या अंकात विवेकानंद यांचे स्वागत करताना ‘आम्हाला काही चमत्कार दाखवा’ असा अग्रलेख प्रसिद्ध झाला. त्याच्या दुसर्‍या दिवशी पुन्हा एक अग्रलेख .त्यात लिहिलं होतं, चमत्कार करता येत नाहीत तेंव्हा विवेकानंद यांच्या विषयीचा भ्रमाचा भोपळा फुटला.

पण आता मात्र ओ.पी. डेलडॉक जे स्वामीजींच्या विचारांचे पुरस्कर्ते होते त्यांनी वृत्तपत्राची मागणी आणि विसंगती दाखवणारं सविस्तर पत्रच पाठवलं, जे प्रसिद्ध झालं. धार्मिक विषयात विवेकानंद यांची उघडपणे बाजू घेणारे लोकही तिथे होते.

युनिटेरियन चर्च मध्ये १८ फेब्रुवारी ला धर्म प्रवचनासाठी रेव्हरंड रीड स्टुअर्ट यांनी ‘पूर्व दिशेचा उघडत असलेला दरवाजा’  असा विषय मांडला.विवेकानंद यांच्या विचारधारेशी समन्वय साधणारे भाषण त्यांनी केले, पश्चिमेकडे विज्ञान आहे ,तर पूर्वेकडे अध्यात्म आहे. पश्चिमेकडे पंथ आहे तर पूर्वेकडे अनेक पंथांना सामावून घेणारा धर्म आहे.असे सांगितले.

तर बेथ एल या मंदिरात रॅब्बी ग्रोसमन यांनी, ‘विवेकानंदांनी आपल्याला काय दिले?’ हाच विषय प्रवचनाला निवडला.अगदी ऐकण्यासारख आहे हे . रॅब्बी म्हणतात, “ विवेकानंदांचे विचार ऐकताना मन  अगदी उल्हसित होऊन जाते. धर्म आणि ईश्वर संकल्पना या बाबतीत आपण पाश्चात्य फार मागे आहोत. धर्म म्हणजे नुसता विचार नव्हे, तर साक्षात दैनंदिन जीवन. आपल्याजवळ फार मोठ्या सुरेख आणि आकर्षक कल्पना आहेत. पण त्या हवेत तरंगत असतात. आपणा पाश्च्यात्यांचा देव आकाशात आहे. आणि रविवार सकाळपुरतेच काही कार्य आपण त्याच्यावर सोपविलेले आहे.विवेकानंदांचा ईश्वर पृथ्वीवर आहे. तो परमेश्वर नित्य क्षणाक्षणाला आपल्याजवळ आहे.बागेतील प्रत्येक फुलात, वार्‍याच्या झुळुकीत,आपल्या शरीरातील रक्ताच्या क्षणाक्षणातील स्पंदनात परमेश्वर भरून राहिला आहे. हा विचार आपण हिंदूंकडून उचलला पाहिजे. आपल्या पंथांना भिंती आहेत. पूर्वेकडील धर्म चहू दिशांनी खुला आणि स्वीकारशील आहे.

एखाद्या अगदी गरीब माणसाच्या दरात अकस्मात कोणीतरी येतो तेंव्हा घरातील लहान मूल ओरडून सांगते अतिथि अतिथि. त्या अतिथि साठी घरातले सर्वजण त्याच्यासमोर उभे राहतात. कारण त्याच्या रूपाने दरात परमेश्वर आला आहे अशी शिकवणूक त्या माणसांना मिळालेली असते. ही केव्हढी सुंदर कल्पना आहे. पाश्च्यात्यांच्या घरी बाहेरच्या खोलीत येणार्‍याला किती उपचार(formality) सांभाळावे लागतात.हे आपल्याला माहिती आहे. आपले चर्च पवित्र आहे तेही फक्त रविवारी”.अशा पद्धतीने ग्रोसमन यांनी त्यांना समजलेले विवेकानंद यांचे विचार मांडले. म्हणजेच विवेकानंद यांनी आपल्या धर्माचे काय महत्व आहे ,आपला धर्म काय शिकवण देतो, ते तिथे अशा प्रकारे मोठ्या अभिमानानेच सांगितले असणार.ग्रोसमन चे हे प्रवचन इव्हनिंग न्यूजला मानवले नाही. त्याने ग्रोसमन यांच्यावर टीका केली.

पुढे पुढे तर विवेकानंदा यांच्या विधांनांचा विपर्यास करून तशा बातम्या,लेख प्रसिद्ध होऊ लागले. कोणी स्वामीजींची बाजू मांडू लागले आणि आश्वस्त करू लागले की, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. सगळेच लोक हलक्या मनाचे व संकुचित वृत्तीचे नाहीत, आम्ही ख्रिस्ता ची शिकवणूक मानणारे तुमचं स्वागत करतो. आणि ज्या शिवराळ भाषेत विवेकानंद यांच्या बद्दल लिहिले जात आहे ते ख्रिस्ताच्या शिकवणुकीला न शोभणारे आहे असे खडसावले होते. एव्हढी टिका  चालू होती पण विवेकानंद यांच्या व्यख्यांनाना प्रचंड गर्दी होत होतीच.अनेक जण त्यांना भेटायला येत. स्वामीजींना भोजन आणि अल्पोपहार याची सतत निमंत्रणे येत.

एक तरुण उद्योजक, मिशिगन-पेनिनशूलर कार कंपनीचे भागीदार चार्ल्स एल. फ्रिअर एक धनवंत होते.  त्यानेही स्वामीजींसाठी भोजन समारंभ आयोजित केला होता. तो खूप थाटामाटाचा होता.शिवाय विवेकानंद यांना त्यांच्या कामासाठी तेंव्हा २०० डॉलर्सची देणगी ही दिली होती.         

मिसेस बॅगले म्हणतात, आमच्या घरातील विवेकानंद यांच्या वास्तव्याचा प्रत्येक दिवस आनंद पूर्ण झाला.बॅगले ज्या भागात राहत होत्या तिथे सर्व धनवान मंडळी राहत होती.त्यांनी आपल्या निवासस्थानी स्वामीजींचे एक व्याख्यान ठेवले. सर्वांना जाहीर निमंत्रण असल्याने खूप गर्दी झाली.स्वामीजी दोन तास बोलले. चर्चा, वाद उत्तर प्रतिउत्तर सुरूच राहिले. सडेतोड व्याख्यान झाले.केवळ आठ दहा दिवसात मिशनरी हादरून गेले होते.

पण डेट्रॉईट च्या बाहेरून विरोध ऐकू यायला लागला होता.रेव्हरंड आर. ए. हयूम यांनी विवेकानंद यांना त्यांच्या भाषणावर आक्षेप घेणारे पत्र लिहिले,विवेकानंद यांनी त्याला लगेच उत्तर दिले. हयूम भारतात जन्मलेले,वाढलेले आणि मिशनरी म्हणून भारतात काम केलेले गृहस्थ. आता त्यांनी पुन्हा पत्र पाठवले. मात्र स्वामीजींनी त्याला उत्तर दिले नाही, कारण सार्वजनिक वादात आपल्याला ओढण्याचा प्रयत्न त्यांच्या लक्षात आला. हयूम यांनी मद्रास मध्ये ‘हिंदू’ या वृत्तपत्रात आलेला अग्रलेख याचा आधार घेऊन हे पत्र लिहिले होते. हा अग्रलेख संपादक जी. सुब्रम्हण्यम अय्यर यांनी लिहिला होता. जे भारतात सर्व धर्म परिषदेसाठी समिति नेमली होती त्यात ते एक सदस्य होते.

हयूम यांनी मार्च मध्ये पाठवलेली पत्रे एप्रिल मध्ये डेट्रॉईट फ्री प्रेस मध्ये प्रसिद्ध झाली. विवेकानंद या वादात नसतानाही त्यांना त्यात ओढण्याचा घाट घातला होता. त्याला वृत्तपत्रातून त्या पत्राच्या बाजूने आणि विरुद्ध बाजूने ही उत्तरे देण्यात आली. धर्मोपदेशकांनी तर स्वामीजींच्या वागण्या बोलण्यावर आणि चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यास सुरुवात केली.  ही सर्व वार्ता विवेकानंद आलसिंगा पेरूमल यांना पत्राने कळवत होते.

आता ही सर्व बातमी मिसेस बॅगले यांच्या कानावर आली. त्यांच्या ओळखीच्या मिसेस स्मिथ यांनी कळवले की विवेकानंद यांच्यावर नाना तर्‍हेच्या गोष्टी बोलल्या जात आहेत. ते संतापी आहेत, त्यांचे वर्तन शुद्ध नाही, असे आरोप ही केले जात आहेत. हे ऐकून आपण अस्वस्थ झालो आहोत. बॅगले यांनी आपले मत सांगावे असे विचारले होते. स्वामीजी तर तेंव्हा बॅगले यांच्याकडेच राहत होते.पण बॅगले आता नेमक्या अॅनिस्क्व्यामला गेल्या होत्या.तिथून त्यांनी पत्र लिहिले आणि म्हटले ….

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भव्य स्वयंपाक उत्तम… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? विविधा ?

☆ भव्य स्वयंपाक उत्तम… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

भव्य स्वयंपाक उत्तमस्वयंपाक कसा असावा ह्या बद्दल

 श्री समर्थ  रामदास स्वामी महाराज लिहितात —

           शक्ती बुद्धी विशेष ।

           नाही आलस्याचा विशेष ।

           कार्यभागाचा संतोष ।

                  अतिशयेसी ॥

स्त्रियांना काम करावयाचे तर शक्ती पाहिजे आणि काम कसे करावे यासाठी बुद्धीही पाहिजे आणि काम करताना आळस नसावा. समर्थांच्या मते आळस हा मनुष्याचा शत्रू आहे. केलेल्या कामाचा संतोष असावा. कोणालाही खाऊ घालताना तृप्त वृत्ती असावी.

ही ओवी समर्थ रामदास स्वामींच्या ‘स्वयंपाकिणी’ या स्फूट समासातील आहे. समर्थ रामदास हे असे संत आहेत की, ज्यांनी जीवनातील प्रत्येक गोष्टींवर मार्गदर्शन केले आहे.

            आता ऐका स्वयंपाकिणी ।

            बहुत नेटक्या सुगरणी ।

            अचूक जयांची करणी ।

                    नेमस्त दीक्षा ॥

स्वयंपाक करताना पदार्थ नीट करावे ते कसे असावे –

           गोड स्वादिष्ट रुचिकर ।

            येकाहून येक तत्पर ।

            न्यून पूर्णाचा विचार ।

               कदापि न घडे ॥

घरात होणारा स्वयंपाक हा घरातील सर्व व्यक्तींना योग्य अशा प्रकारचा असला पाहिजे.

             रोगी अत्यंत खंगले ।

         तेणे ते अन्न पाहिजे भक्षिले ।

              भोजन रुचीने गेले ।

                 दुखणे तयाचे ॥

अत्यंत खंगलेल्या रोग्यालाही उत्तम वाटेल असे अन्न सुगरणीने करावे जेणे करून ते अन्न खाल्ल्याने त्याचे दुखणेही दूर होईल.

           उत्तम अन्ने निर्माण केली ।

              नेणो अमृते घोळिली ।

            अगत्य पाहिजे भक्षिली ।

                    ब्रह्मादिप्ती॥

स्वयंपाक असा असावा की, जणुकाही अमृतच टाकले आहे असे वाटावे. देवांनाही आवडेल असा रुचकर स्वयंपाक करणे हे सुगरणीचे काम असते.

           सुवासेची निवती प्राण ।

           तृप्त चक्षू आणि घ्राण ।

           कोठून आणिले गोडपण ।

                 काही कळेना ॥

स्वयंपाकाच्या नुसत्या वासाने अंत:करण आनंदित झाले पाहिजे. डोळे आणि नाक तृप्त झाले पाहिजे. या पदार्थांची चव इतकी छान असावी की इतकी सुंदर चव कशी आली असा खाणार्‍याला प्रश्‍न पडला पाहिजे. याचे नेहमी पाहत असलेले उदाहरण म्हणजे महाप्रसादाचे जेवण होय. काही विशेष न टाकताही देवासाठी आत्मीयतेने केल्यामुळे महाप्रसादाचा स्वयंपाक अप्रतिमच होतो. तसा घरी कितीही मसाले टाका पण होत नाही.

एवढा उत्तम स्वयंपाक केला की मग प्रथम देवाला नैवेद्य दाखवावा.

             देव वासाचा भोक्ता ।

             सुवासेचि होये तृप्तता ।

                येरवी त्या समर्था ।

                    काय द्यावे ॥

देवाला आपण नैवेद्य दाखवितो. देव फक्त वासानेच तृप्त होतो. आपण सामान्य माणसे देवाला काय देणार. देवाला नैवेद्य दाखविल्यानंतरच बाकीच्यांना जेवावयास वाढावे. जेवताना देवाचे नामस्मरण करावे.

            जनी भोजनी नाम वाचे वदावे ।

           अति आदरे गद्यघोषे म्हणावे ।

           हरीचिंतने अन्न सेवीत जावे ।

           तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे ॥

अशा प्रकारे गृहिणीने स्वयंपाक केला तर सर्व कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहील. सुदृढ कुटुंब सुदृढ समाज निर्माण करेल. अशा या स्वयंपाकाची फलश्रुती समर्थ सांगतात-

          भव्य स्वयंपाक उत्तम |

           भोजनकर्ते उत्तमोत्तम |

           दास म्हणे भोक्ता राम |

                    जगदांतरे ||

अशाप्रकारे केलेले मिष्टान्न चवीने ग्रहण करणारे लोक तृप्त झाले म्हणजे श्रीरामच संतोष पावतात. कारण श्रीरामच सर्वांच्या अंतरी असतात. 🍀

– लेखक कोण ते माहित नाही पण ह्या लेखाबद्दल त्यांना शतशः प्रणाम.

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “रिॲक्ट ॲन्ड रिसपाॅन्ड…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

 

? विविधा ?

☆ “रिॲक्ट ॲन्ड रिसपाॅन्ड…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

एकदा प्रवासात असतांना रेल्वेत एक कोल्ड्रिंक बाँटल आणि एक बिसलरी बाँटल घेण्याचा प्रसंग आला तेव्हा मला एकदम गौरगोपालदासजींचा “रिअँक्ट आँर रिस्पाँड” ह्या  शिर्षकाची  नेहमीप्रमाणेच माँरल असलेली व्हिडीओ क्लिप आठवली.

गौरगोपालदासजींच्या छोट्या छोट्या व्हिडीओ क्लिप्स मध्येही मोठ्ठ तत्वज्ञान दडलेलं असत. त्यांच्या क्लिपमध्ये त्यांनी खूप छान पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी समजावून दिल्या आहेत. पहिलं उदाहरण त्यांनी क्रिकेट ह्या खेळामधील दिले.प्रतिस्पर्धी खेळाडू कित्येकदा आपल्याला उकसवायला वा आपला ताबा गमावण्यासाठी शिव्यांचा वा गैरशब्दांचा वापर करतात जर त्याला बळी न पडता आपण आपला ताबा याने की कंट्रोल स्वतःजवळच ठेवला तर क्रिकेटमधील स्थितप्रज्ञ खेळाडू सचिन तेंडूलकर सारखे आपण होऊच शकू.

ह्या क्लिप मधील मला सगळ्यात आवडलेलं उदाहरण म्हणजे कोल्ड्रिंक आणि साध्या पाण्याचं .हे बघून माझ्याही मनात काही विचार आलेत ते पुढीलप्रमाणे.

खरंच आयुष्य वा जीवन हे साध्या पाण्यासारखं शांत,निर्मळ, समाधान देणारं तसंच स्थिर, खळखळाट नसलेलं,एका स्थितप्रज्ञासारखं असावं वा आपण घालवावं न की कोल्ड्रिंक्स सारख फसफसून वर उचंबळणार,खळखळाट असणारं,आतड्यांना इजा पोहोचवणारं आणि कधीच तृप्तता न देणार.

ह्या बाबतीत मला अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. आपलं वागणं हे कायम आपल्या हातात असतं पण दुसऱ्याचे वागणे आपल्या  हातात अजिबात नसतं त्यामुळे आपण आपल्या जागी शांतपणे वागलं तर मग कुठल्याही अडचणींचा सामना आपण योग्य त-हेने करु शकतो.

थोडक्यात काय तर  गौरगोपालदासजींच्या ह्या क्लिप मधून इतकं मात्र शिकले माणसाने कोल्ड्रिंक्स  सारख न जगता पाण्यासारखं जगलं तर आयुष्य नक्कीच समाधानात, शांत व्यतीत होतं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जिच्या हाती … ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

☆ जिच्या हाती … ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

 ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी’ अशी एक म्हण आपल्या मराठी भाषेत प्रचलित आहे (म्हणजे आता होती म्हणावी लागेल.)आपल्या सुदृढ,सुसंस्कृत भारतीय समाजात ही म्हण अगदी तंतोतंत चपखल होती.जिच्या हाती पाळण्याची दोरी याचा अर्थ असा की जिला मातृत्व लाभलेय तिने आपल्या मुलांची योग्य काळजी घेऊन त्याला सुदृढ,सशक्त,सुसंस्कारी बनवू शकते.असा सुदृढ,सशक्त,सुसंस्कारी तेजस्वी युवक पुढं राष्ट्र मजबूत बनवेल आणि आपल्या राष्ट्राचा उद्धार करेल.स्वामी विवेकानंदासारखा एखादा युवक जग सुद्धा उद्घारेल.

पूर्वी स्त्रिया अशिक्षित होत्या,कदाचित त्यावेळची ही जाहिरातही असेल किंवा देश पारतंत्र्यात असल्यामुळे देशाला अशा तेजस्वी,सुदृढ सशक्त तरुणांची आवश्यकता असेल म्हणूनही कदाचित कुणी विचारवंताने आपल्या या विचाराला समाजासमोर ठेवले असेल.तसेही हा विचार सर्वच काळासाठी लागू आहे कारण ज्या देशातील तरुण  सुदृढ,तेजस्वी,संस्कारी आणि तगडे असतील तर देश सुद्धा तितकाच बलवान व सूनसंस्कृत होईल

“बलसागर भारत होवो

विश्वात शोभूनी राहो..”

अशी प्रार्थना म्हणून तर साने गुरुजी करत असतील.

आपले मूल आपले असले तरीही तो समाजाचा एक घटक असतो न पर्यायाने तो उद्याच्या देशाचा एक सुविद्य, सुसंस्कृत नागरिक असतो आणि हीच खरी आपल्या राष्ट्राची संपत्ती असते पर्यायाने उज्वल देश.त्यासाठी प्रत्येक मातेने आपल्या बालकाला त्या दृष्टिकोनातून घडवायचे असते आणि आपले मूल राष्ट्राला अर्पण करायचे असते.शिवरायांच्या काळात,पारतंत्र्याच्या काळात असे अनेक युवक आपल्या मातेने राष्ट्रार्पण केले म्हणूनच देश स्वतंत्र झाला,शिवरायांनी अशाच मूठभर तगड्या मावळ्यांच्या साथीने आपले स्वराज्य उभे केले.

अगदी नवजात शिशूपासून ते बालक सज्ञान होईतो ते आईच्या सहवासात जास्त असते.त्यामुळं आईच्या संस्कारांचा प्रभाव मुलावर पडत असतोच पण बालकाच्या सशक्ततेसाठी ,त्याच्या सदृढ ,संपन्न,निरोगी आरोग्य पूर्ण जीवनाची पण जबाबदारी मातेवरच येत असते,त्या दृष्टीने मुलाचा आहार विहार,खेळ,व्यायाम याकडेही तिचे जाणीवपूर्वक लक्ष असेल तरच ते बालक उद्याचा सशक्त युवक आणि सुसंस्कारी नागरिक बनेल.असे नागरिक मग देशावर प्रेम करतील, स्वच्छता व सामाजिक आरोग्य जपतील व आपल्या देशाचा सर्वांगीण विकास करतील.देशातील कायदा सुव्यवस्थेचे पालन करतील,कर प्रणाली मजबूत करतील आणि देश प्रगतीपथावर नेतील.यासाठी प्रथम लोकसंख्या नियंत्रण हवे जेणेकरून मर्यादित लोकसंख्येमुळे आपल्याला हवे तसे सुनिश्चित आणि चांगले बदल घडवता येतील.

पण आज आपल्या देशातील युवकांची स्थिती बघता काय दिसते?कुटुंबे विभक्त झालीत,आर्थिक बाजू मजबूत करत असताना घरातील बालकांच्या आरोग्याकडे, संगोपणाकडे दुर्लक्ष होत आहे,शहरात सुशिक्षित जोडप्यांच्या मुलांचे बालपण पाळणा घरात संपत आहे.बरेचदा रविवारी सुद्धा आपल्याला विश्रांती मिळावी म्हणून काही आया मुलाला पाळणा घरात सोडतात.एका बाजूला हे चित्र आहे,दुसऱ्या बाजूला अति सजग आया थोडक्यात माता पिता पालक अगदी नर्सरी /बालवाडी पासून मुलाला करिअरच्या  चक्कीत ढकलतात की ते मूल मोकळा श्वास सुद्धा घेऊ शकत नाही.स्पर्धेचे युग आहे म्हणून त्याला तीन वर्षापासूनच स्पर्धेच्या शर्यतीत ढकलले जाते त्यामुळं ते तिशीतच थकते,म्हातारे होते.अभ्यास,वेगवेगळे क्लास ,वेगवेगळ्या स्पर्धात त्याचे बाल्य करपतेआणि तारुण्य कोमेजते,उमलायच्या,फुलायच्या वयातच त्यांचे निर्माल्य होते.

बदललेली सामाजिक स्थिती,अत्याधुनिक मनोरंजनाची साधने,मोबाईल यामुळं ७०%तरुणाई भरकटत चालली आहे म्हणलं तरी वावगे ठरणार नाही.पूर्वी घरात पाच पन्नास माणसे असत त्यामुळं मोठ्यांच्या वागण्या बोलण्यातील शिस्त,आदर्श, सुसंस्कार आपोआपच मुलांच्या अंगी येत.घरातील सर्वच स्त्रियांचे सर्व मुलांकडे लक्ष असायचं,त्यामुळं मुलं सुरक्षित वातावरणात वाढत,त्यांना आपसूकच कुटुंबाचा भक्कम आधार मिळायचा,आणि सगळे प्रेमळ पालकही.आज उलट चित्र आहे,घरा घरात कलह वाढत आहे,संयुक्त कुटुंबाकडून  विभक्ता कुटुंबाकडे आपण गेलोच आहोत पण भविष्यात आई किंवा वडील यापैकी एकच पालक मुलाला असेल की काय अशी भीती निर्माण झाली आहे.मुले दिशाहीन होत आहेत.नैराश्य आणि गुन्हेगारी वाढत आहे,चंगळवाद फोपावल्याने सामाजिक अस्थिरता आणि विषमता वाढीस लागली आहे.

पूर्वी स्त्रिया अर्थार्जन करत नसत त्यामुळं चोवीस तास आपल्या मुलांसोबत असल्याने मुलांच्या सवयी,मुलांचे खेळ,आरोग्य,अभ्यास याकडे लक्ष देता येत असे.आज अर्थार्जन ही काळाची गरज आहे,गरज असली न नसली तरीही स्त्रिया अर्थार्जन करत आहेत आणि अर्थातच मुलांकडे दुर्लक्ष होते,बरेचदा आयुष्यात पैसा खूप असतो पण मुले बिघडलेली असतात,वाया गेलेली असतात.याउलट मध्यम आर्थिक स्थिती असणारे,किंवा ग्रामीण भागातील मुले तुलनेत जास्त समंजस आणि जबाबदार असतात.

असो, ज्यावेळी देशातील स्त्री पुरुष दोन्ही अर्थार्जनासाठी बाहेर पडतात,तेव्हा सरकारने बालकांची काळजी घेणारी व्यवस्था उभी करायला हवी असते,कामाच्या ठिकाणीच त्या त्या कम्पन्यांनी सुद्धा अशा व्यवस्था उभ्या करायला हव्यात.अण्णाभाऊ साठेंच्या एका लेखात मी वाचलं होतं की एक रशियन माता रेल्वेतून प्रवास करत आहे आणि तिचे बाळ (अर्थातच भावी रशियन नागरिक) तिथंच पाळण्यात शांतपणे झोपले आहे.)समाजातील अगदी खालच्या स्तरापासून वरच्या स्तरावरील मुलांची अशी सोय होणे गरजेचे आहे. तिथल्या सरकारने सरकारने तिथल्या रेल्वेतून अशी सोय केली आहे.असे चित्र मला आपल्या देशात कुठं दिसलं नाही,आता या चार दोन वर्षात झाली असेल सोय तर माहीत नाही.

काळाची चाके चालत राहतात कधी हळू तर कधी जलद पण फिरून पुन्हा तिथंच कधीतरी येतो त्याला बराच कालावधी लागतो पण या कालावधीत बरेच काही निसटते, हरवते. आज आपल्या देशातील कुमारांची/कुमारीची,तरुण/तरुणींची स्थिती खरेच चिंतनीय आहे.

आपली मुले प्रथम आपली संपत्ती आहे त्यानंतर समाजाची व पर्यायाने देशाची,तिची जपणूक व्यवस्थित रित्या झाली तरच एका सशक्त राष्ट्राची निर्मिती होईल असे मला तरी प्रामाणिकपणे वाटते.

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “स्वतःला ओळखा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “स्वतःला ओळखा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट☆

कित्येक दिवसांपासून रोज मनाशी ठरवित होते,आज तरी नक्की करु करु म्हणत साचल्या गेलेली कामं करायचीच. शेवटी ह्या एक दोन दिवसात मनावर घेऊन जुन्या भाषेत पदर खोचला,कंबर कसली वगैरे वगैरे…….

शेवटी एकदाचा अत्यावश्यक कामाला मुहूर्त निघाला. कधीची दारावर नेमप्लेट नव्हती, ती अगदी फुरसत काढून करायला टाकली, छान हव्वी होती तशी मनासारखी नेमप्लेट बसवल्याने एकदम दिल खुश.

खरंच म्हंटली तर अगदी लहानशी साधीसुधी पण अत्यावश्यक गोष्ट, नेमप्लेट म्हणजे नावाची पाटी.  आपल्या घरी पहिल्यांदा येणाऱ्या व्यक्ती, कुरीयर आणणारी व्यक्ती किंवा  पोस्टमन ह्या सगळ्यांच्या आणि आपल्या सोयीसाठी हवीच असणारी  ही बाब.

नावाची पाटी बघितल्यावर एकदम मनात विचार आला,ही असते आपली ओळख. पण खरंच व्यक्तीचं नाव हीच असते का फक्त त्या व्यक्तीची ओळख ?

व्यक्ती ची ओळख ही नावामुळे तर होते पण त्याचबरोबर त्याच्या दिसण्यावरुन, वागण्याबोलण्या वरुन, त्याच्या एकूण व्यक्तीमत्वावरुन,स्वभावावरुन,कर्मावरुन पण ओळख ही ठरतेच. अगदी सुरवातीला जन्माला आल्याबरोबर आपल्याला नाव आडनाव मिळतं ही आपली पहिली ओळख. स्त्रियांना लग्नानंतर पण आडनाव बदलून अजून एकदा नावावरून ओळख मिळते.

माणसाला ओळख त्याच्या हुशारीवरुंन, कर्तबगारीवरुन,सफलतेवरुन वा यशस्वी झाल्यावर पण मिळते.

व्यक्तीला ओळख ही त्याच्या स्वभावावरुन पण मिळते. त्यामुळे व्यक्तीच्या कायम स्मरणात राहणाऱ्या गोष्टी ही त्याची ओळख बनते.

ह्या ओळखीवरच मागेही एकदा एक पोस्ट लिहीली होती.त्यातील काही भाग परत एकदा ह्यात आलायं.

मागे एकदा गौरगोपालदासजींची छान बोधपर क्लिप बघण्यात आली. त्यात त्यांनी उदाहरण देऊन समजावून सांगितले की बहुतांश लोकांची धडपड ही दुसऱ्या सारखे बनण्यासाठी सुरू असते. मान्य आहे प्रत्येकाचे कोणी ना कोणी आयडाँल म्हणजेच आदर्श असतात. ह्या आदर्शवत व्यक्तींच्या व्यक्तीमत्वा मुळे ,सदगुणांमुळे आपल्याला भुरळ पडते आणि आपण आपली सगळी ताकद, एनर्जी ही त्या आदर्शमागे धावण्यात घालवतो आणि शेवटी खरोखरच थकून जातो. आपण त्या व्यक्तीची काँपी करुन संपूर्णतः त्या व्यक्तीसारखे बनण्याच्या नादात आपले कलागुण, आपली ओळख आपली ओरिजनँलिटी घालवून बसतो. बस आपली स्वतःला घडवितांना  सगळ्यात मोठी चूक हीच असते.

एकदा असचं सहज झेरॉक्स काढताकाढता सहज लक्षात आलं मूळ प्रतीची काँपी करुन झेरॉक्स कामं तर भागलं पण मूळ प्रतीच्या क्वालिटी ची सर झेरॉक्स ला नाही.

बँकेच्या कामकाजात ग्राहकांची ओळखपत्रे घेणे,त्यांची ओळख पटवून घेणे ही नित्याचीच बाब.पण खरचं ओळखपत्रांवर अवलंबून असलेली एवढीच असते आपली ओळख?, निश्चितच नाही. आपली स्वतःची ओळख ही त्यापलीकडे पण स्वतःला तरी निश्चितच व्हायला हवी.बरेचदा अनूभवांती लक्षात येत व्यक्ती ह्या आपली स्वतःची ओळख सांगतांना आपल्या स्वतःबद्दल कमी बोलून आपली ओळख इतरांना माध्यम बनवून, त्यांचा परिचय देऊन केला जाते.

मुळात प्रत्येक व्यक्ती ही बहुआयामी असते. तिच्यामध्ये अनेक सुप्त गुण दडलेले असतात. फक्त गुणांवर,कौशल्यावर थोडी राख बसलेली असते, ती राख प्रयत्नपूर्वक एकदा का झटकली तर तुमच्यातील कलागुण, वैशिष्ट्य ही ठळकपणे जाणवायला लागतात. स्वतःची ओळख तयार करणं हे फारस कठीण नसतं, फक्त आपण त्याचा इंन्फेरीअर काँम्प्लेक्समुळे बाऊ करतो. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागाल,स्वतः मधील स्व ला प्राधान्य, महत्त्व द्याल.

मला विचाराल तर मी ठामपणे सांगेन मी माझ्या लेखनामुळे फार काही मोठी लेखिका नाही बनू शकणार, पण एक निश्चित मी माझी निराळी आगळीवेगळी लेखनशैली तर निर्माण करूच शकते.

थोडक्यात काय तर तुम्ही इतरांना स्पेस आवर्जून द्या पण त्याचबरोबर स्वतःमधील स्व ला सुद्धा प्राधान्य द्या.तुम्ही जर स्वतः वर प्रेम केलतं तरच जग पण तुम्हाला मान देईल महत्त्व देईल हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

18/12/2022

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कल्याणमस्तु… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ कल्याणमस्तु… ☆ श्री अरविंद लिमये ☆

‘आपले कल्याण देवच करीत असतो’ हा मनातला भाव ‘इदं न मम’ या भावनेतून उमटत असेल तर ते योग्यच आहे.पण आपल्या आयुष्यात खूप कांही चांगलं घडतं, आपल्याला यश मिळतं, आपल्या अपेक्षा पूर्ण होतात तेव्हा सर्वसाधारणपणे ‘माझ्या कष्टांचं फळ मला मिळालं, मी केलेल्या प्रयत्नांना यश आलं’ हाच विचार उघडपणे व्यक्त केला नाही तरी ठळकपणे मनात असतोच. अडचणीच्या, संकटाच्या वेळी मात्र हिम्मत न हारता ती परिस्थिती स्विकारून प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची जिद्द महत्त्वाची असते.पण अशावेळी हतबल होणारे, देवानेच आपल्या मदतीला धावून यावे, अडचणींचा परिहार करावा यासाठी देव देव करणारेच अनेकजण असतात. आपल्या हातून एखादी चूक घडली तर देवानेच मला दुर्बुद्धी दिली अशी सोयीस्कर समजूत करून घेऊन त्याचा दोष स्वतः स्विकारण्याची बऱ्याच जणांची तयारी नसते. अशी माणसे यशाचं, उत्कर्षाचं श्रेय देवाला देऊन ही त्याचीच कृपा असं वरवर म्हणतही असतील कदाचित पण त्या त्यावेळी मनातला त्यांचा अहं मात्र  अधिकाधिक टोकदारच होत जात असतो.

माणसाच्या प्रवृत्तीचं हे विश्लेषण अर्थातच ‘कल्याण’ या शब्दाबद्दल विचार करत असतानाच नकळत घडलेलं. त्याला कारणही तसंच आहे.

‘कुणाचं कल्याण करणारे आपण कोण? परमेश्वरच खऱ्या अर्थाने कल्याण करीत असतो’ हे गृहित, कल्याण या शब्दाचे असंख्य कंगोरे सर्वांचे क्षेमकुशल ध्वनित करणारे आहेत हे आपण समजून घेतले तर ‘ कल्याण करणारे आपण कोण? ते परमेश्वरच करीत असतो’ हे गृहित मनोमन तपासून पहायला आपण नक्कीच प्रवृत्त होऊ.हे व्हायला हवे.अन्यथा ‘कल्याण हे ईश्वरानेच करायचे असते’ हाच ग्रह मनात दृढ होत जाईल.

‘कल्याण ‘या शब्दात लपलेले या शब्दाचे विविध छटांचे अर्थ आपल्यालाही आपल्या गतायुष्यातले अनेक क्षण पुन्हा तपासून पहायला नक्कीच प्रवृत्त करतील.

कल्याण म्हणजे क्षेम. कल्याण म्हणजे मंगल, कुशल शुभ. कल्याण म्हणजे भद्र, श्रेय, सुख आणि स्वास्थ्यही. आनंद, सौख्य, मांगल्य, बरं, भलं म्हणजेही कल्याणच. सुदैव, भाग्य, हित, लाभ, ऐश्वर्य,या शब्दांतून ध्वनित होणारं बरंच कांही ‘कल्याण’ या एकाच शब्दात सामावलेलं आहे. उत्कर्ष, भाग्योदय, अभ्युदय, भरभराट, प्रगती या सगळ्यांनाही ‘कल्याण’च अभिप्रेत आहे!

या वरील सर्व शब्द आणि अर्थ यांच्यामधे जे लपलेलं आहे ते ते आयुष्यातल्या अनेक टप्प्यांवर वेळोवेळी आपल्याला मिळालेलं आहेच. कांही क्वचित कधी निसटलेलंही. जे मिळालं ते माणसाला वाटतं आपणच मिळवलंय. पण ते मिळायला, मिळवून द्यायला, ते मिळवण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करायला आपल्या आयुष्यात त्या त्यावेळी डोकावून गेलेले कुणी ना कुणी निमित्त झालेले असतातच. बऱ्याचदा हे आपल्या लक्षांत तरी येत नाही किंवा अनेकजण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष तरी करतात. खरंतर त्या त्या वेळी निमित्त झालेल्या कुणाला विसरुन न जाता त्याच्याबद्दलची कृतज्ञता आपण जाणिवपूर्वक मनोमन जपायला हवी. ‘अहं’चा वरचष्मा असेल तर ती जपली जात नाहीच.आणि जे ही कृतज्ञता जपत असतात ते त्यांच्या संपर्कात आलेल्यांना त्यांची त्यांची अडचण दूर करायला अंत:प्रेरणेनेच प्रवृत्तही होतात. ही नेमक्या गरजेच्या वेळी आपल्या संपर्कात येऊन आपल्याला मदत करून जाणारी माणसं परमेश्वराची कृपाच म्हणता येईल.

‘त्यांच्या रूपाने परमेश्वरच मदतीला धावून आला ‘असा भाव जेव्हा कृतार्थतेने एखाद्याच्या मनात निर्माण होतो त्याचा हाच तर अर्थ असतो.

एखाद्या मनोमन कोसळलेल्या माणसाला आपण नकळत सावरणं, आपल्या कृतीने, आपुलकीने एखाद्याच्या दुखऱ्या मनावर हळूवार फुंकर घालणं हे त्या त्या व्यक्तिसाठी किती मोलाचं  असतं हे मला माझ्या आयुष्यातले सुखदुःखाचे प्रसंग आठवताना अनेकदा तीव्रतेनं जाणवतं.

खुशालीची, आपुलकीची पत्रं येणं,पाठवणं कालबाह्य झालेलं आहे. पण ती जेव्हा त्या त्या काळातली गरज होती तेव्हा ती गरज निर्माण झालेली होती  परस्परांबद्दल मनात जपलेलं प्रेम आणि आपुलकी यामुळेच. तिकडे सगळं ‘क्षेमकुशल’ असावं ही मनातली सद्भावना इतरांचं ‘कल्याण’ चिंतणारीच असायची.

आदरभावाने नतमस्तक होऊन नमस्कार करणाऱ्यांसाठी मनातून उमटणारा ‘कल्याणमस्तु’ हा आशिर्वाद आंतरिक सदभावना घेऊनच उमटत असल्याने खऱ्या अर्थाने फलद्रूप होण्याइतका कल्याणकारी निश्चितच असायचा.

काळानुसार होणाऱ्या सार्वत्रिक बदलांच्या रेट्यात होणाऱ्या पडझडीमुळे हा सद्भाव त्याची आंतरिक शक्ती हरवत चाललाय असं वाटायला लावणारं सर्वदूर पसरु लागलेलं निबरपण  माणसाच्या मनातल्या हितकारक भावनाही निबर करत चाललाय आणि तोच ‘जनकल्याणाला’

सुध्दा मारक ठरत चाललाय हे आपल्या लक्षातही न येणं हाच सार्वत्रिक कल्याणातला मुख्य अडसर आहे.तो दूर होईल तेव्हाच ‘कल्याणमस्तु’ हा आशिर्वाद सशक्तपणे उमटेल आणि खऱ्या अर्थाने सफलही होईल!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – विरजण ! – ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 😂 चं म त ग ! 🙊 विरजण ! 🤠 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“गुडमॉर्निंग पंत !”

“नमस्कार, नमस्कार ! बोल आज काय काम काढलस ?”

“थोडं दही हव होत विरजण लावायला.”

“ती वाटी खाली ठेव आणि बस बघु आधी खुर्चीवर.”

“पण पंत विरजण… “

“त्याची कसली काळजी करतोस?  मी सांगतो हिला तुला विरजण द्यायला, पण त्याच्या आधी माझ एक काम आहे तुझ्याकडे.”

“बोला ना बोला पंत, तुम्ही माझ्यासाठी एवढं… “

“जास्त मस्काबाजी नकोय, मला गेल्यावेळेस जसा डोंबिवलीच्या करव्यासाठी ट्रेनचा आवाज टेप करून दिला होतास ना…. “

“त्याच आवाजाची आणखी टेप हव्ये का तुम्हाला, देन डोन्ट वरी, संध्याकाळी ….”

“उगाच गुडघ्याला बाशिंग लावलेल्या नवऱ्या सारखा उधळू नकोस, मी काय सांगतोय ते नीट ऐक.”

“सॉरी पंत, बोला.”

“अरे करव्याला त्या ट्रेनच्या आवाजाच्या टेपचा चांगलाच उपयोग झाला आणि त्याच्या झोपेचा पण प्रश्न सुटला, पण…. “

“पण काय पंत ?”

“अरे नुसता आवाज ऐकून त्याला झोप येईना. मला फोन करून सांगितलन तस.”

“मग ?”

“म्हणाला ‘या आवाजा बरोबर ट्रेन मधे बसल्याचा फिल यायला हवा, तरच झोप येईल’ आता बोल !”

“मग तुम्ही त्यांचा तो प्रॉब्लेम कसा काय सॉल्व केलात ?”

“अरे त्याला सांगितलं, झोपेच्या वेळेस तू नुसती ट्रेनच्या आवाजाची टेप चालू नको करुस, तुझ्याकडच्या रॉकिंग चेअर मध्ये बस आणि मग टेप चालू कर आणि मला सांग, तुला झोप येते की नाही.”

“मग आली का झोप कर्वे काकांना तुमच्या उपायाने?”

“अरे न येवून सांगते कोणाला, दहा मिनिटात त्याची गाडी खंडाळ्याचा घाट चढायला लागली !”

“पंत, पण कर्वे काका घरी रॉकिंग चेअर मधे बसून ट्रेनच्या आवाजाची टेप ऐकत होते ना, मग एकदम त्यांची गाडी खंडाळ्याचा घाट कशी काय चढायला लागली ?”

“मी गेल्या वेळेसच म्हटले होत तुला, तुमच्या आजकालच्या पिढीचा आणि मातृभाषेचा काडीचाही……. “

“पंत तुम्हीच तर म्हणालात ना की कर्वे काकांची गाडी…. “

“अरे म्हणजे तो गाढ झोपून घोरायला लागला, आता कळलं?”

“मग त्यांची गाडी खंडाळ्याचा घाट… “

“अरे आमच्या पिढीचे ते मराठी आहे, तुला नाही कळायचं.”

“असं होय, पण आता तुमचं नवीन काम काय ते सांगा आणि मला विरजण देवून मोकळ करा !”

“हां, अरे करव्याचा झोपेचा प्रॉब्लेम मी सॉल्व केल्याची बातमी अंधेरीला राहणाऱ्या जोशाला, कशी कुणास ठाऊक, पण कळली.”

“बरं !”

“अरे त्याचा मला लगेच फोन, मला पण हल्ली रात्री झोप येत नाही, मला पण टेप पाठवून दे !”

“ओके, मी आजच संध्याकाळी ट्रेनच्या आवाजाची टेप… “

“अरे असा घायकुतीला येऊ नकोस, त्याला ट्रेनच्या आवाजाची टेप नकोय, विमानाच्या….. “

“आवाजाची टेप हवी आहे ?”

“बरोबर !”

“पण पंत विमानाच्या आवाजाची टेप कशाला हवी आहे जोशी काकांना ?”

“अरे त्याची अंधेरीची सोसायटी एअरपोर्टच्या फनेल झोन मधे आहे आणि…. “

“फनेल झोन म्हणजे काय पंत ?”

“अरे फनेल झोन म्हणजे, जिथे सगळ्या सोसायटया एअरपोर्ट जवळ असल्यामुळे कमी मजल्याच्या असतात आणि त्यांना दिवस रात्र विमानाच्या आवाजाचा प्रचंड त्रास होतो आणि…….”

“सध्या विमान वाहतूक बंद असल्यामुळे त्यांच्या आवाजा शिवाय जोशी काकांना पण रात्रीच्या झोपेचा प्रॉब्लेम झाला आहे, बरोबर ? “

“बरोबर !”

“ओके, नो प्रॉब्लेम, संध्याकाळीच तुम्हाला विमानाच्या आवाजाची टेप आणून देतो, मग तर झालं ! आता मला या वाटीत जरा विरजण द्यायला सांगा बघु काकूंना.”

“अरे हो, हो, विरजण कुठे पळून चाललंय.  आधी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दिलेस तर लगेच तुला विरजण देतो, बोल विचारू प्रश्न ?”

“हो, विचाराना पंत.”

“मग मला असं सांग, या जगात कोणी कोणाला प्रथम विरजण दिले असेल ?”

“अरे बापरे, खरच कठीण प्रश्न आहे हा आणि मला काही याच उत्तर येईलसे वाटत नाही.”

“मग तुला विरजण…… “

“थांबा पंत, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि त्याच उत्तर तुम्ही बरोबर दिलेत तर मला विरजण नको, ओके ?”

“मला माहित आहे तू मला तुझ्या बालबुद्धीने काय प्रश्न विचारणार आहेस ते.”

“काय सांगता काय पंत, मग सांगा बघू मी कोणता प्रश्न विचारणार आहे ते.”

“तोच सनातन प्रश्न, कोंबडी आधी की….. “

“चूक, शंभर टक्के चूक !”

“नाही, मग कोणता प्रश्न विचारणार आहेस ?”

“आधी मला प्रॉमिस करा, की तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही, तर विरजण द्याल म्हणून !”

“प्रॉमिस, बोल काय आहे तुझा प्रश्न.”

“मला असं सांगा पंत, ज्याने पहिले घड्याळ बनवले, त्याने कुठल्या घड्याळात बघून त्याची वेळ लावली असेल ?”

“अं… अं…. अग ऐकलंस का, याला जरा वाटीत विरजण दे पाहू.”

© श्री प्रमोद वामन वर्तक

१०-०१-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग – ५१ – दानशूर जॉन डी रॉकफेलर ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग – ५१ – दानशूर जॉन डी रॉकफेलर ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

मॅडम कॅल्व्हे  स्वामी विवेकानंद यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचे पुढचे आयुष्य बदलून गेलेले दिसते .कुठल्याही अडीअडचणीच्या वेळी, संकटाच्या वेळी, दु:खाच्या वेळी माणसाला योग्य मार्गदर्शन मिळाल्याने आधार वाटतो आणि त्यातून तो सावरायला मदत होते, बाहेर पडायला मदत होते. एव्हढच काय, सर्व काही चांगलं असताना सुद्धा योग्य दिशा तर हवीच ना? तशी योग्य मार्गदर्शन करणारी, योग्य माणसंही आपल्याला माहिती हवीत. आजच्या काळात ती असायलाही हवीत.  

स्वामीजी शिकागो मध्ये इतर ठिकाणी ही फिरत होते. त्यांच्या संपर्कात वेगवेगळी माणसे येत होती. एव्हाना परिषदेपासून त्यांची चांगलीच प्रसिद्धी झाली होती.स्वामीजींच्या भेटीतून आपल्याला चांगले तत्वज्ञान समजू शकते, त्यांच्या चांगल्या विचारांनी योग्य दिशा मिळू शकते असा विश्वास तिथल्या लोकांमध्ये निर्माण झाला होता.जे जे त्यांना भेटत, त्यांच्या विचारात बदल होत असे.

अशीच एका धनवंताची भेट स्वामीजिंबरोबर झाली. ते होते जॉन डी. रॉकफेलर.( जन्म-८ जुलै १८३९ मृत्यू २३ मे १९३७) मोठे व्यावसायिक होते. तेलसम्राट म्हणून ओळखले जात होते.

रॉकफेलर घराणे हे  प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपतींचे दानशूर घराणे. आधुनिक खनिज तेल उद्योगाचा विकास करण्याचा, त्याचप्रमाणे अतिशय मोठ्या प्रमाणावर परोपकारी व जनहितकारक कृत्ये करण्याचे श्रेय या उद्योगसमूहाला जाते. विशेषत: अमेरिकन वैद्यकशास्त्राला आधुनिकीकरणाचा साज देण्याचे कर्तृत्व या घराण्याचे आहे. जॉन हे या घराण्यातील पहिले उद्योगपती, Standard Oil उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेलउद्योगाचा संस्थापक. शिक्षण पूर्ण केल्यावर १८५९ मध्ये क्लार्क यांच्या भागीदारीत दलालीचा धंदा सुरू केला. १८५९ मध्ये अमेरिकेतल्या पेनसिल्वेनिया च्या टायटसव्हील मध्ये जगातली पहिली तेल विहीर खोदली गेली. १८६३ मध्ये जॉन यांनी ‘अँड्रूज, क्लार्क अँड कंपनी’ स्थापन करून तेलशुद्धीकरण उद्योग सुरू केला. दोन वर्षांनी ‘रॉकफेलर अँड अँड्रूज कंपनी’ स्थापन केली. १८८२ मध्ये ‘Standard Oil Trust’ या मोठ्या उत्पादनसंस्थेची स्थापना करण्यात आली. या ट्रस्टच्या नियंत्रणाखाली अमेरिकेतील ९५% तेलउद्योग, लोहधातुकाच्या खाणी, लाकूड कारखाने, वाहतूक उद्योग यांसारखे अनेक उद्योग होते.

जॉन यांनी १८९५ च्या सुमारास Standard Oil Company चे दैनंदिन व्यवस्थापन आपल्या सहकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यास प्रारंभ केला होता. तेलउद्योगातून मिळणाऱ्या प्रचंड नफ्यापैकी बराचसा भाग बाजूला काढून तो लोहधातुकाच्या खाणी व न्यूयॉर्कमधील व्यापारी बँकिंग व्यवसाय या दोन अतिशय विकासक्षम उद्योगांकडे त्यांनी वळविले. मोठ्या प्रमाणावरील लोकोपकारविषयक कार्ये, हे जॉन यांच्या जीवनातील दुसरे मोठे वैशिष्ट्य होते. त्यामुळे ते तेलउद्योगापेक्षा या कार्याबद्दल अधिक ख्यातकीर्त झाले होते. हे किती विशेष म्हटले पाहिजे. आपल्याजवळील अफाट संपत्तीचा काही भाग जनकल्याणार्थ खर्च करणे आवश्यक आहे; नव्हे, ते आपले कर्तव्यच आहे, अशी त्यांची भावना होती. केवळ आपल्या वारसदारांना सर्व संपत्ती मिळणे इष्ट नसल्याचे त्यांचे ठाम मत होते. म्हणून त्यांनी अमेरिकेतील वैद्यकशास्त्र, शिक्षण तसेच संशोधन यांचा विकास व उन्नती यांकरिता लक्षावधी डॉलर खर्च केले. अनेक धर्मादाय संस्था उभारून त्यांचे संचालन सुयोग्य विश्वस्तांच्या हाती ठेवले व त्यांच्या दैनंदिन कार्यवाहीसाठी लोककल्याणाची तळमळ व आस्था असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी नेमले. अशा संस्थांद्वारा जॉन यांनी सुमारे साठ कोटी डॉलर रकमेचा विनियोग केला. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांमधील अतिशय हलाखीची शैक्षणिक अवस्था सुधारण्यासाठी ‘जनरल एज्युकेशन बोर्ड’ हे मंडळ व ‘शिकागो विद्यापीठ’ या दोन्ही संस्था त्यांच्या प्रचंड देणग्यांमधून स्थापन झाल्या.पुढेही शिकागो विद्यापीठास त्यांनी आपल्या मृत्यूपर्यंत सुमारे आठ कोटी डॉलर देणगीरूपाने दिले.

जॉन यांनी १९०२ मध्ये स्थापन केलेल्या ‘General Education Board’ या शैक्षणिक मंडळाचा अमेरिकेतील शिक्षणाचा वंश, धर्म, जात, लिंग यांचा विचार न करता विकास करणे हे उद्दिष्ट होते. १९५२ अखेर या मंडळाने आर्थिक अडचणीमुळे आपले कार्य थांबविले. पन्नास वर्षांच्या कालखंडात महाविद्यालये व विद्यापीठे, वैद्यकीय शाळा, शैक्षणिक संशोधन प्रकल्प व शिष्यवृत्त्या अशा विविध शैक्षणिक कार्यक्रमांसाठी मंडळाने पैसे खर्च केले. १९०१ मध्ये रॉकफेलर वैद्यकीय संशोधन संस्था न्यूयॉर्कमध्ये स्थापण्यात आली. आरोग्यशास्त्र, शस्त्रक्रिया, वैद्यक व तदनुषंगिक शास्त्रे यांच्या संशोधन कार्यात मदत, रोगांचे स्वरूप, कारणे व निवारण या कार्यात मदत व संशोधन आणि यांविषयी झालेल्या व होणाऱ्या संशोधनाचा व ज्ञानाचा सार्वजनिक कल्याणार्थ प्रसार करणे अशी या संस्थेची उद्दिष्टे होती. पुढे याच संस्थेचे रॉकफेलर विद्यापीठामध्ये रूपांतर करण्यात आले. जगातील मानवजातीच्या कल्याणाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून रॉकफेलर प्रतिष्ठान या लोकोपकारी संघटनेची १४ मे १९१३ रोजी स्थापना करण्यात आली.

जॉन यांचे सुरूवातीचे दिवस –

खरं तर जॉन अमेरिकेतल्या न्यूयॉर्क जवळील रिचफोर्ड या खेड्यात राहणारा सर्व सामान्य कुटुंबातला मुलगा होता. वडीलही पोटापाण्यासाठी साधं काहीतरी काम करायचे, जॉन मोठा झाल्यावर गावच्या बाजारात भाजी, अंडी असे विकू लागला.मग पुस्तकाच्या दुकानात काम करू लागला. थोडे पैसे साठवून पेनसिल्वेनिया मध्ये जाऊन नगरपालिकेच्या रस्त्यावरील दिव्यांसाठी रॉकेल पुरविण्याच काम करू लागला. इथे थोड स्थैर्य मिळालं. इतर गावातही रस्त्यावरील दिव्यांसाठी रॉकेल पुरवण्याचे काम प्रयत्न करून मिळवलं. यातून तेलाचं महत्व ओळखून जॉन बरेच काही शिकला होता आणि भविष्यात ज्याच्याकडे तेल त्याचेच हे जग हे त्याने ओळखले. मग ऑइल रिफायनरीत पैसे गुंतवले. तेल विहीरींचे पीक आले. आणि बुडीत तेलविहीर कंपनी रॉक फेलर ने लिलावात विकत घेतली. ती म्हणजेच स्टँडर्ड ऑइल. आता जॉन च्या हातात सगळ आलं. तेलाच्या ऑर्डर मिळत होत्या. त्याला रिफायनारीची जोड दिली. तेल साठवण्यासाठी पत्र्याचे डबे लागत त्याचाही कारखाना स्वत:च घातला. एका राज्यातून हे डबे वाहतूक करायला स्वत:चे  टँकर्स बनवले. पुढे रेल्वे वॅगन ची गरज होती तेही तयार केले आणि त्या वॅगन, ने आण करण्यासाठी स्वत:चा रेल्वे मार्गही टाकला . इतकी मेहनत करून आपल साम्राज्य त्याने उभ केलं होत. सदैव सैनिका पुढेच जायचे या चालीवर …..  हा जॉन पुढे पुढे जातच होता, प्रगती करत होता.  

 एव्हढं माहिती करून देण्याचं कारण म्हणजे इतका हा प्रगती केलेला, श्रीमंत झालेला माणूस एका हिंदू तत्वज्ञानाच्या संपर्कात आल्यावर त्याचे मन कसे परिवर्तन होऊ शकते त्याचं हे उदाहरण आहे. तेही परदेशात हे विशेष.

रॉकफेलर यांचे एक व्यावसायिक सहकारी मित्र होते, त्यांच्याकडे स्वामीजी राहत असताना ते जॉन यांना आग्रह करीत की, ‘एकदा स्वामी विवेकानंदांना तुम्ही भेटा’. पण जॉन स्वाभिमानी होते, त्यांना कुणी सुचवलेले मान्य होत नसे. पण एकदा अचानक त्यांच्या मनात आले विवेकानंदांना भेटायचे आणि म्हणून, ते स्वामीजींना भेटायला त्या सहकार्‍याकडे पोहोचले. कुठलाही शिष्टाचार न पाळता जॉन सरळ विवेकानंद यांच्या खोलीत गेले. स्वामीजी त्यांच्या खोलीत योग अवस्थेत बसले होते. त्यांनी मान सुद्धा वर केली नाही. पाहिले नाही. जॉन बघतच राहिले. थोडा वेळ गेल्यानंतर, स्वामीजी म्हणाले, “तुम्हाला जी संपत्ती मिळाली आहे, ती तुमची नाही. तुम्ही केवळ एक माध्यम आहात. तुम्ही लोकांचं भलं करावं. इतरांना सहाय्य करण्याची, त्यांचं कल्याण करण्याची संधी तुम्हाला मिळावी, म्हणून ईश्वराने ही संपत्ती तुम्हाला दिली आहे”. हे ऐकून मनातून दुखावलेले रॉकफेलर तडक घरी आले ते हा विषय डोक्यात घेऊनच. एक आठवड्याने पुन्हा ते स्वामी विवेकानंद यांना भेटायला गेले. तेंव्हाही स्वामीजी योग अवस्थेतच बसलेले होते. रॉकफेलर यांनी एक कागद स्वामीजींपुढे टाकला. त्यावर, आपण एका सार्वजनिक संस्थेला भरघोस देणगी देण्याचे ठरविले आहे असे लिहिले होते.आणि म्हणाले,आता यामुळे तुमचे समाधान होईल आणि त्यासाठी तुम्ही माझे आभार मानायला हवेत. विवेकानंद यांनी कागदावरून शांतपणे नजर फिरवली पण वर पाहिले नाही आणि म्हणाले, “ठीक, यासाठी तुम्ही मला धन्यवाद द्यायला हवेत”. मनस्वी असलेले रॉकफेलर यांची ही पहिली मोठी देणगी होती. विशेष म्हणजे, १८९५ पासून त्यांच्या गाजलेल्या कल्याणकारी निधींचा प्रारंभ झाला. म्हणजे एका क्षणी स्वामीजींच्या भेटीत लोकांसाठी आर्थिक सहाय्य करावं या सूचनेचा राग आलेले रॉकफेलर यांनी आता कल्याणकारी निधिला सुरुवात केली हा मोठा बदलच होता. पुढे त्यांच्या मानव सेवा कार्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, “मानवी जीवनात केवळ पैशाचा संग्रह करत बसण्यापेक्षा मोलाचं असं काहीतरी आहे, संपत्ती हा माणसाच्या हातात असलेला केवळ एक विश्वस्त निधि आहे त्याचा त्याचा अयोग्य पद्धतीने वापर करणे हे पाप आहे. जीवनात अखेरच्या क्षणाला उत्तम प्रकारे सामोरं जाण्याची तयारी करणं म्हणजेच सतत दुसर्‍यासाठी जगत राहणं होय आणि ते मी करतो आहे”. हाच होता स्वामीजींच्या संपर्काचा प्रभाव.

रॉकफेलर घराण्याने वैद्यक, शिक्षण, कला, सांस्कृतिक घडामोडी इत्यादी क्षेत्रांना प्रचंड प्रमाणावर आर्थिक साह्य देऊन मानवजातीचे कल्याण व विकास अव्याहत होत राहील यासाठी प्रतिष्ठाने व विविध निधी उभारून दानशूरतेचे कार्य अखंडपणे चालू ठेवले आहे.

असे अनेक लोक स्वामीजींना भेटत होते. परिषद संपल्यानंतर पावणेदोन महीने आसपासच्या गावांमध्ये त्यांची व्याख्याने पण झाली. त्यांनी व्याख्यानांसाठी एक करार केला होता. स्लेटन लायसियम ब्यूरो या संस्थेशी तीन वर्षांचं करार केला की त्यांनी व्याख्याने द्यायची त्या बदल्यात स्वामीजींना पैसे दिले जातील. असे केल्यास पैसा जमवून तो भारतातल्या कामासाठी उपयोगी पडेल असे स्वामीजींना पटवण्यात आले होते. दौर्‍यातील पहिले व्याख्यान झाल्यावर स्वामीजींना 100 डॉलर्स देण्यात आले. त्यामुळे असा कार्यक्रम सुरू झाल्याने स्वामीजींची धावपळ, सतत प्रवास, मुक्काम सुरू झाले. दमछाक झाली. करार झाल्यामुळे तो एक व्यापार झाला होता ते अनुषंगुन  काम करणे भाग होते आणि हे आपल्याला शक्य नाही असे अनुभव घेतल्यानंतर स्वामीजींच्या लक्षात आले.

दौरा ठरविणारी ब्यूरो व्यवसाय म्हणून त्याकडे बघत असते. जाहिरात, वृत्तपत्रे प्रसिद्धी, व्याख्यानांचे भित्तिपत्रके असा दिनक्रम स्वामीजींना नकोसा झाला. यावेळी मेंफिस इथं आठवडयाभरचा मुक्काम झाला आणि स्वामीजी सुखावले.१३ ते २२ जानेवारी १८९४ मध्ये ते मेंफिसला थांबले.हयू एल ब्रिंकले यांचे पाहुणे म्हणून ते मिस व्हर्जिनिया मून यांच्या निवासगृहात उतरले होते. त्या नुसते निवासगृह चालवीत नव्हत्या तर गोरगरिबांना सढळ हाताने मदत करणे हे ही काम करत. त्यांच्या दानशूर वृत्तीमुळे त्या मेंफिस मध्ये प्रसिद्ध होत्या. इथे त्यांची दोन व्याख्याने झाली. मेंफिसला जरा त्यांना शांतता लाभली. इथे पत्रकारांनी वृत्तपत्रासाठी  मुलाखती घेतल्या, वेगवेगळ्या लोकांच्या घरी भेटी,परिचय, चर्चा झाल्या.  स्वामीजींच्या विचारांनी पत्रकार सुद्धा भारावून गेले होते.

वुमेन्स कौन्सिल मध्ये १६ जानेवारीला मानवाची नियती या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. यात ते म्हणाले, “ परमेश्वराची भीती वाटणे हा धर्माचा प्रारंभ आहे. तर त्याच्याविषयी प्रेम वाटणे ही धर्माची परिणती आहे. मानवाचं मूलभूत पाप या सिद्धांतात वाहून जाऊ नका. जेंव्हा अॅडमचा अध:पात झाला, तेंव्हा तो पवित्रतेपासून झाला. त्याच्या पावित्र्याला ढळ पोहोचला,हे पतनाचे कारण. तेंव्हा मूळ आहे ते पावित्र्य. पतन नंतरचं आहे”. हे त्यांचे उद्गार श्रोत्यांची मने हेलावून गेले.मेंफिस च्या आठ दिवसाच्या मुक्कामात कळत नकळत स्वामीजींनी लोकांच्या मनात अध्यात्मिकतेच्या विचारांचे बीज पेरले होते. सर्वांचा प्रेमळ निरोप घेऊन मेंफिसहून स्वामीजी शिकागोला परत आले . तीन आठवडे राहिल्यानंतर, तिथून ते  डेट्रॉईटला आले.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बाहर उजाला, अंदर विराना… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

? विविधा ?

☆ बाहर उजाला, अंदर विराना… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) 

पैरों में ना साया कोई, सर पे ना साईं रे

मेरे साथ जाए ना, मेरी परछाई रे

बाहर उजाला है, अंदर विराना

एखाद्या गाण्यातल्या काही ओळी आपल्याला  आतून बाहेरून हादरून सोडतात, तशा या ओळी आहेत. जेव्हा जेव्हा मी या ओळी ऐकतो तेव्हा तेव्हा मी आतून बाहेरून हादरून निघतो. पुन्हा पुन्हा या ओळींचा विचार करतो. सभोवतार काय चालले आहे पाहतो,  वृत्तपत्रातील मथळा वाचतो, टिव्हीवर मुख्य बातम्या ऐकतो आणि पुन्हा या ओळींकडे येतो. अनेकांच्या कहाण्या या ओळींशी मिळत्या जुळत्या सापडतात. अगदी माझ्या आयुष्यातील काही काळ काही क्षण या ओळींशी मिळते जुळते सापडतात.

सुप्रसिद्ध गीतकार गुलझार यांनी लिहिलेले गीत आहे हे. पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी याला संगीत दिले आहे तर भारतरत्न लता मंगेशकर यांनी हे गीत स्वरबद्ध केले आहे. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायीकेचा राष्ट्रीय पुरस्कार या गाण्याला मिळाला तर सर्वोत्कृष्ट गीतकाराचा फिल्म फेअर पुरस्कार या गाण्याला मिळाला.

आपल्या आयुष्यात असाही काळ येतो जेव्हा कोणीच सोबत नसल्याची भावना होते, अगदी परमेश्वरसुद्धा आपल्यावर रूसून बसला आहे की काय असे वाटू लागते. नेमक्या याच भावनेला गुलझार यांनी शब्दांच्या चिमटीत नेमके पकडले आहे – पैरों में ना साया कोई, सर पे ना साईं रे. या काळात आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. या निर्णयांशी आपण आतून सहमत असतोच असे नाही पण तरीही हे निर्णय घेतोच. याच अवस्थेचे वर्णन करताना गुलझार म्हणतात – मेरे साथ जाए ना, मेरी परछाई रे. म्हणजे माझ्या सावलीनेही आता माझी साथ सोडली आहे.

बरे हे सगळे घडत असताना आजूबाजूचा सर्व समाजच दुःखी असतो का तर नाही. सुख दुःखाचे गणित न्युटनच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे आहे. जेव्हा एक दुःखी असतो, तेव्हा दुसरा कोणी सुखी असतो. काळाचे चक्र फिरत राहते आणि पहिला सुखी होतो तर दुसरा दुःखी होतो. पण या संक्रमणात आपल्या मनात मात्र वादळे उठतात. कारण बाहेर कोणी दसरा दिवाळी करत असताना आपल्या मनात मात्र सुतक चालू असते. या कडव्याचे शेवट याच भावनेतून  गुलझार यांनी केले आहे – बाहर उजाला है, अंदर विराना. बाहेर सगळीकडे उजळलेले आहे, आनंदी आनंद आहे आणि माझ्या आतमध्ये मात्र अंधार आहे, माझा आतमध्ये जणू ओसाड वाळवंट पसरलेले आहे.

तसे पाहिले तर संपूर्ण गाणेच भारी आहे. त्याला हृदयनाथजींच्या संगीताने सोन्याचेकडे लाभले आहे तर लतादीदींच्या स्वरांनी हे गाणे स्वर्गीय केले आहे. आपल्यापैकी बहुतेकांनी हे गाणे ऐकलेच असेल. माझ्यासाठी पुन्हा ऐका.

लेखक : म. ना. दे.

(श्री होरापंडीत मयुरेश देशपांडे)

C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७

+९१ ८९७५३ १२०५९ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “’सलाम’ आणि बरंच काही…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “’सलाम’ आणि बरंच काही…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट☆

प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या वयापरत्वे, काळापरत्वे बदलत जातात. वाचन ही आपली प्रमुख आवड असली तरी त्याचे विषय, लेखक हे हळूहळू बदलत जातात. साहित्याची मुळातच आवड असल्याने अशाच वयाच्या एका वळणावर पाडगावकरांच्या कवितांची जबरदस्त फँन होते,नव्हे अजूनही आहेच म्हणा. नुकताच  मंगेश पाडगावकरांचा स्मृतीदिन झाला. त्यांना आणि त्यांच्या साहित्यातील योगदानाला कोटी कोटी प्रणाम.

प्रत्येक भाषा आणि त्या त्या भाषेतील सौंदर्य हे वेगवेगळं असतं.त्या भाषांमधील साहित्याची एकमेकांत तुलनाच होऊ शकत नाही. परंतु सगळ्यात प्रिय म्हणालं नं तर बहुतेक प्रत्येकाला आपली स्वतःची मायबोलीच असते. ह्या मायबोलीलाच मायमराठी म्हणू वा मातृभाषा म्हणू. मला तर ह्या मराठीमधील साहित्य वाचतांना अतीव समाधान, आनंद भरभरून मिळतो.कुठल्याही क्लिष्ट विषयाचे आकलन आपल्याला आपल्या मातृभाषेतून चटकन होतं.आपल्या स्वतःच्या भाषेतील भावना ह्या चटकन जाऊन थेट ह्रदयापर्यंत जावून भिडतात. इतकचं कशाला आपण परप्रांतात गेलो असतांना तिकडे सर्रास दुस-या भाषेचा प्रघात असतांना अचानक कुणी आपल्याशी आपल्या मातृभाषेतून संवाद साधला तर इतकं समाधान,इतका अत्यानंद होतो की अगदी ते “कलेजेमे ठंडक”ह्याचा अर्थ अगदी पुरेपूर समजून येतो.असा अनुभव आम्ही बरेचदा तिरुपती ला गेल्यावर घेतलायं.  

पाडगावकरं ह्यांच्या कवितांनी अक्षरशः मराठी रसिक दर्दी प्रेक्षकांना वेड लावलं होतं, नव्हे वेड लावलं आहे.त्यांच्या कवितांबद्दल बोलतांना अक्षरशः बावचळून जायला होतं. कारण त्यांची अमूक एखादी रचना आपल्याला खूप आवडते अस वाटतं नं वाटतं तोच त्यांची दुसरी एखादी काव्य रचना मनाला अधिक स्पर्शून जाते.परत तिसरीच एखादी कविता हळूवारपणे पणे मनाच्या अगदी आतील कप्प्यात शिरुन बसते तर चौथीच एखादी कविता खदखदून हसायला लावून शेवटी खोल विचारात आणून सोडते.त्यांना त्यांच्या “सलाम” ह्या कवितेसाठी 1980 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, तसेच महाराष्ट्रभूषण व पद्मभूषण हे मानाचे पुरस्कार देखील प्राप्त झालेत. दुबई येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भुषविलं. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत ह्या दोन भाषांमध्ये एम.ए.केलं.श्री वसंत बापट, वि.दा. करंदीकर व पाडगावकरं ह्या त्रिमूर्ती ने एकत्र काव्यवाचन करण्याची प्रथा सुरू केली. त्यांनी स्वतःची अशी एक आगळीवेगळीच शैली निर्माण केली. वात्रटिका, उपरोधिक कविता, प्रेमाच्या कविता ह्यात त्यांचा हातखंडा होता. पाडगावकरांच्या खूप सा-या आवडणा-या कविता आहेत त्यापैकी काही पुढीलप्रमाणे, “जेव्हा तुझ्या बटांना, उधळी मुजोर वारा, “सलाम”,”चिऊताई चिऊताई दार उघड”,”सांगा कसं जगायचं”,”तुमचं आमचं सेम असतं”,ह्या रचना तर चिरकाल स्मरणात राहणाऱ्या आहेत. “या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे” ह्या गाण्याने तर कित्येक जणांना नैराशेच्या खाईतून बाहेर काढले आहे.

साठहून अधिक वर्षांच्या लेखन कारकिर्दीत पाडगावकरांनी इतर भाषांतील साहित्यकृतींचे अनुवादही भरपूर केले. ‘थॉमस पेनचे राजनैतिक निबंध’ हा त्यांनी केलेला अनुवाद १९५७ साली प्रकाशित झाला होता आणि २००९-१०मध्ये ‘बायबल’चा अनुवाद प्रकाशित झाला. कमला सुब्रह्नण्यम या लेखिकेच्या मूळ इंग्रजी महाभारताचा पाडगांवकरांनी ‘कथारूप महाभारत’ या नावाचा दोन-खंडी अनुवाद केला आहे. या दीर्घ कालावधीत त्यांनी विविध विषयांवरच्या पंचवीसहून अधिक पुस्तकांचा अनुवाद केला. निबंध, कथा, कविता, कादंबरी, नाटक, इतिहास, चरित्र, आत्मचरित्र असे सर्व साहित्यप्रकार आणि विविध विषय यांत आहेत.

त्यांनी केलेल्या एकूण अनुवादांमधे १७  साहित्यकृतींचे अनुवाद आहेत. याशिवाय जे. कृष्णमूर्ती यांच्या ‘Education And The Significance Of Life’ या पुस्तकाचा ‘शिक्षण : जीवनदर्शन’ या नावाने त्यांनी अनुवाद केला आहे. निवडक समकालीन गुजराती कवितांचा त्यांनी केलेला अनुवाद ‘अनुभूती’ या नावाने प्रकाशित झालेला आहे. मीरा, कबीर आणि सूरदास यांच्या निवडक पदांचे अनुवाद त्यांनी केले आहेत. आणि ‘ज्युलिअस सीझर’, ‘रोमिओ आणि ज्युलिएट’, ‘दी टेम्पेस्ट’ या शेक्सपिअरच्या तीन नाटकांचे ‘मुळाबरहुकूम भाषांतरे’ही त्यांच्या नावावर आहेत. पाडगावकर यांनी या तीनही पुस्तकांना दीर्घ प्रस्तावना लिहिलेल्या आहेत आणि परिशिष्टांत भाषांतराविषयीची स्पष्टीकरणे दिलेली आहेत. अशाच दीर्घ प्रस्तावना ‘कबीर’ आणि ‘सूरदास’ या पुस्तकांनाही आहेत. अनुवादांचा आस्वाद घेताना या प्रस्तावनांमधील विविध संदर्भांचा उपयोग होतो.

पाडगावकरांच्या साहित्यिक कारकिर्दीत ‘मीरा’ या अनुवादित पुस्तकामध्ये मीराबाईंचे चरित्र,जीवन आणि काव्य या विषयी लिहिलेले आहे. मीराबाईचे काव्य पाडगावकरांनीच प्रथम मराठीत आणले असे त्यात म्हटले आहे.

एकदा पाडगावकरांची पावसावरची कविता ‘लिज्जत’ने पाहिली आणि पाडगावकरांना विचारले, ‘आमच्या जाहिरातीत वापरू का ही कविता?’ पाडगावकरांनी आनंदाने परवानगी दिली आणि ती जाहिरात अनोखी ठरली.  पाडगावकरांना लोक गंमतीने पापडगावकर म्हणू लागले.

पाडगावकरांनी मराठी बालकुमार साहित्य संमेलन, विश्व साहित्य संमेलन ह्यांचे अध्यक्षपद भुषविले. त्यांना सलाम ह्या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार,महाराष्ट्र भूषण पुरस्कार ,पद्मभूषण पुरस्कार,महाराष्ट्र साहित्य परिषदेचा म.सा.प. सन्मान पुरस्कार प्राप्त झाले होते.

खरंच अशा महान विभूती आपल्यासाठी खूप सारा अनमोल खजिना ठेऊन गेलेत हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares