☆ “थोरात म्हणजे मराठा का ?” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
(हसून हसून रडायचे की रडून रडून हसायचे? हे तुमचं तुम्हीच ठरवा..)
मित्राच्या गावच्या जत्रे साठी त्याच्या बरोबर त्याच्या गावाकडे गेलो होतो. जत्रा झाल्यावर दोन दिवस थांबलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच दोघांनी त्याच्या शेतावर चक्कर टाकली.
साठी पार केलेला म्हातारा पलीकडच्या ऊसाच्या बांदावर ऊन खात थांबलेला. मित्राकडे पाव्हणे कोण कुठले चौकशी झाली. पत्रकार होतो, पुस्तकं लिहितो वगैरे सांगितल्यावर त्याला माझ्या बद्दल आदर वाटला असावा. मला साहेब म्हणू लागला. कोरोना, भाजीपाला, महागाई, गुऱ्हाळाच्या आणि इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर लांबवर पाहत त्यानं प्रश्न विचारलाच…..
☆ हम बोलेगा ईमोजी बेहेतर बोलता है ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
काय मंडळी खरे आहे ना? माझा तरी अनुभव तसाच आहे. अपना हाल एक ईमोजी सबको बिना बोले बताता है| तर झाले असे,माझी मैत्रीण ( जी सतत ईमोजी मधून बोलत असते ) तिची चूक नाही बरं का.एकदा ती आजारी होती. बरे सांगावे कसे ?ग्रुप वर मेसेज केला तर कोणी विचारपूस करेना मग तिने ईमोजी स्टेटसला.आणि घोळच झाला.सगळ्यांना वाटले तिला अपघात झाला किंवा डोके दुखत आहे.मग तशी चौकशी सुरू झाली.आणि सर्दी झाली आहे सांगता सांगता खरेच डोके दुखी झाली.पण इतक्या चौकशा झाल्या म्हंटल्यावर स्वारी ईमोजी माय झाली की.
हे ईमोजी महत्व माझ्या काही डोक्यात बसेना.तरी पण बघू प्रयत्न करून म्हणून तिच्या पावलावर पाऊल प्रमाणे ईमोजी वर ईमोजी ठेवून मी पण ईमोजी धर की टाक करते आणि हसे करून घेते.काय होते कोणी काही म्हंटले की पोस्ट आवडली की मी कोणताही भेद न करता ( स्त्री पुरुष ) दिलून टाकते.सांगायचे इतकेच असते,पोस्ट आवडली.आणि छान वाटले.पण त्यातून नसती आफत ओढवते ना. आणि काय चुकले कळतच नाही.
मग एक समजले ईमोजी जसे शब्दा वाचून बोलतात तसे चुकीचे ईमोजी फार धोकादायक .एकदा अतीच फजिती केली ना या ईमोजी रावांनी.एकदा गृपवर कोणासाठी तरी श्रद्धांजली अर्पण केली होती.मी पण घाई घाई हे पोस्टवून टाकले.खूप सारे रिप्लाय आले होते त्यात सर्वांनी माझी चांगलीच खिल्ली उडविली होती.मग लक्षात आले रडक्या ईमोजी ऐवजी चुकून हे साहेब तेथे घाई घाई गेले होते.
खरी गंमत येते हे ईमोजी राव पोस्टल्यावर.प्रेमात बुडालेला हा जास्तच डेंजर. (लाल टेंगुळ – एका मैत्रिणीने याचे केलेले नामकरण ) हा लहान मुलांना चालेल,मैत्रिणीला चालेल.पण नको तिथे घाईने/चुकीने गेला तर? जिथे गेला तिथे आनंदी आनंद.आणि आपली कोंडी. आणि (तीन टेंगळे – कोणाला तरी खरीच आणेल) हे म्हणजे एकदम चाटून पुसून काम.
हे सोपे कसले हे तर माझ्या सामान्य किंवा बाळ बुध्दीला एकदम अवघड काम.बरे कतीही काळजी घेतली किंवा उसनी हुशारी आणली तरी ही भाषा काही जमत नाही. कारण भलभलते गैरअर्थ काढण्यात समोरचे पटाईत (अगदी आपली चूक असली तरी ).मग काय पुन्हा चूक आपलीच असल्याचे पुरावे सादर केले जातात.
आणि हो हे झुके भाऊ कधी बदल करतील सांगता येत नाही.डोळे झाकून ईमोजी घाई घाई पोस्टावा तर तिथे वेगळाच अपरिचित (अर्थ न कळलेला) ईमोजी राव येऊन बसलेला असतो.आणि आपल्याला फजितून टाकतो.
असे अनुभव जमा करत करत ईमोजीराव पोस्टताना फार काळजी घेते पण तरीही भिक नको पण कुत्रे आवर या प्रमाणे कोणीतरी म्हणतेच, टाईप कर फोन कर पण ईमोजी आवर मग मी जास्तच दक्षता घेते.अगदी गुगल बाबां कडून सगळी माहिती घेते.अर्थ समजून घेते.पण काहीतरी घोळ होतोच आणि शिंगरू मेलं हेलपाट्याने या प्रमाणे मी मरते हे चुकीचे इमुंचे (लाडा चे नाव हो) अर्थ किंवा अनर्थ निस्तरताना.
कदाचित हे चुकीने टाकलेले किंवा घाईने पोस्टलेले मेसेज यातून गैरसमज किंवा गैरअर्थ निघू नयेत या साठीच एडिट किंवा डिलीट चे रबर दिले असावे. व माझ्या सारख्या चुकून पोस्टणाऱ्या लोकांची सोय केली असावी.
पण मी दमून जाते हो हे निस्तरताना.आणि ठरवते काही उलट सुलट होण्या पेक्षा चूप बसावे.
आता हे शेपूट फारच लांबत चालले.तर सांगायचे इतुकेच की शब्दावाचून बोलणारे ईमोजी चुकले तर शब्दांच्या पलीकडले अनर्थ करतात.त्या मुळे हे भाऊ नीट अर्थ समजल्या बिगर पोस्टू नयेत.
आमचे घर एक मजली होते. ढग्यांचं घर अशी त्या घराला ओळख होती.
ज. ना. ढगे म्हणजेच जनार्दन नारायण ढगे
उत्तम शिक्षक, प्रसिद्ध लेखक,साहित्यप्रेमी, तत्त्वचिंतक,(फिलॉसॉफर),संत वाङमयाचे गाढे अभ्यासक,प्रवचनकार,व्याख्याते आणि एक यशस्वी बिझनेसमन अशी त्यांची विविध क्षेत्रातील ओळख होती. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची म्हणजेच माझ्या वडिलांविषयी मी लिहीनच पण तत्पूर्वी माझं लहानपण ज्या घरात गेलं, ते घर, परिसर आणि तिथलं वातावरण आणि त्यातून झालेली आयुष्याची मिळकत हीही माझ्यासाठी खूप मोलाची आहे.
आठवणी खूपच आहेत. मनाच्या कॅनव्हासवर अनेक रेघारेघोट्यांचं जाळं चित्रित झालेलं आहे आणि आजही जेव्हा जेव्हा मन उघडं होतं तेव्हा तेव्हा या चित्रांचं पुन्हा एकदा सुरेख प्रदर्शन मनात मांडलं जातं.
घराच्या खालच्या मजल्यावर दोन दोन खोल्यांचे स्वतंत्र असे खण होते. हल्लीच्या शब्दात म्हणायचे तर ब्लॉक्स होते. फ्लॅट्स हा शब्द या घरांसाठी उचित नाही. फ्लॅट म्हटलं की एक निराळी संस्कृती, निराळे आकार, निराळी रचना, संपूर्णपणे वेगळीच जीवन पद्धती नकळतच उभी रहाते. फार तर दोन दोन खोल्यांची ती स्वतंत्र घरे होती असं म्हणूया आणि त्यात गद्रे आणि मोहिले हे आमचे दोन भाडोत्री रहात होते. वाचकहो! भाडोत्री हा शब्दही मला आवडत नाही. भाडोत्री या शब्दात दडलाय एक तुच्छपणा, काहीसा उपहास अगदीच टाकाऊ आणि नकारात्मक शब्द आहे हा असे मला वाटते. “ ते आमचे भाडोत्री आहेत.” असं म्हणणारा मला उगीचच गर्विष्ठ वाटतो. कुठेतरी अहंकाराचा दर्प तिथे येतो. अशावेळी खरोखरच मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान असला तरीही टेनन्ट हा शब्द भावना न दुखावणारा वाटतो. असो. सांगायचं होतं ते इतकंच की त्या खालच्या मजल्यावरच्या दोन स्वतंत्र घरात गद्रे आणि मोहिले यांचे परिवार भाड्याने राहत होते. महिन्याला पाच रुपये असे भरभक्कम भाडे! दोन्ही घरांना मागचं दार होतं आणि तिथेच एक मोरी होती. ती त्या दोघांकरिता सामायिक होती. कपडे धुण्यासाठी एक घडवलेला काळा चौकोनी दगड आणि पाण्यासाठी नळही होता आणि मोरीच्या एका बाजूला कॉमन टॉयलेटही होतं.संडास म्हणण्यापेक्षा टॉयलेट बरं वाटतं.शिवाय त्यावेळी फ्लश नसायचे पण त्या काळात भाड्याने राहण्यासाठी ज्या सोयी सुविधा अपेक्षित होत्या त्या सर्व या घरांसाठी होत्या असं म्हणायला हरकत नाही आणि अशा या घरामध्ये हे दोन परिवार सुखाने राहत होते.
गद्रे होते ब्राह्मण आणि मोहिले होते चांद्रसेनीय कायस्थ प्रभू. गद्रे कट्टर कोकणस्थ आणि मोहिले पक्के मांस मच्छी खाणारे. मोहिलेंच्या ताईंनी बोंबील तळले की गद्रे वहिनी मागचं दार धाडकन जरा जोरातच आपटून लावायच्या आणि दार आपटल्याचा आवाज आला की माझी आजी वरून गद्रे वहिनींवर रागवायची,” अहो दारं आपटू नका. दार मोडलं ना तर स्वतःच्या खर्चाने नवे दार बसवावे लागेल हे लक्षात ठेवा.”
अखेर आम्ही घरमालक होतो ना?
पण अशा थोड्याफारच धुसफुसी होत्या बाकी सारी गोडी गुलाबी होती. गद्रे वहिनी त्यांच्या कोकणस्थित माहेराहून येताना फणस घेऊन यायच्या आणि त्याचे गोड,रसाळ गरे सगळ्या गल्लीत वाटायच्या.
पाऊस पडला की पहिल्या आठवड्यात शेवळं ही रानभाजी ठाण्यात मिळायची. अजूनही मिळते. या शेवळाची भाजी अथवा कणी मोहिले ताईंनी केली की त्या वाटीभर घरोघरी पाठवायच्या. वेगळ्या चवीची रुचकर भाजी आणि खूप मेहनतीची पण लहानपणी खाल्लेल्या या रानभाजीची चव आजही माझ्या रसानेवर तशीच्या तशी आहे. ही अत्यंत गुंतागुंतीची आणि मेहनतीची भाजी करण्याच्या भानगडीत मी कधीच पडले नाही कारण माझ्या डोळ्यासमोर याही भाजीचा एक इतिहासच आहे.
माझे वडील यास्तव खास सायकलवरुन बाजारात जाऊन टोपलीभर शेवळं घेऊन यायचे. बाजारात, ती पाऊस पडल्यावर एक दोनदाच मिळते म्हणून ही बेगमी करून ठेवायची. या भाजीची निवडून साफसफाई माझी आजी अत्यंत मन लावून करायची. ती शास्त्रशुद्ध चिरून भर तेलात तळून ठेवायची आणि अशी ही चिरलेली तळून ठेवलेल्या शेवळाची भाजी निदान चार-पाच वेळा तरी वेगवेगळ्या प्रकाराने घरात शिजायची. या कामासाठी वडील,आई आणि आजी अत्यंत झटायचे आणि आम्ही ती चाटून पुसून खायचो. त्यावेळी खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी रेफ्रीजरेटर ही संकल्पना इतकी प्रचलित नव्हती. आणि अभावानेच पण ज्यांच्याकडे असायचा त्या ठाण्यातल्या धनवान व्यक्ती होत्या. आणि त्यांची घरे अथवा बंगले जांभळीनाका,नौपाडा,घंटाळी अशा उच्चस्तर वस्तीत असायचे. त्यांचा क्लासच वेगळा होता.
मात्र अशी ही पारंपरिक आणि गुंतागुंतीची, प्रचंड मेहनतीची शेवळाची भाजी आजही माझी ताई आणि धाकटी बहीण निशा तीच परंपरा सांभाळत तितकीच चविष्ट बनवतात आणि तुम्हाला खरं वाटणार नाही पण आजही मी केवळ ती भाजी खाण्यासाठी पुण्याहून ठाण्याला बहिणीकडे जाते कारण शेवळाची भाजी हा माझ्यासाठी केवळ खाद्यपदार्थच नव्हे तर या चवीभोवती माझ्या बालपणीच्या रम्य आणि खमंग आठवणी आहेत.हे व्यावहारिक नसेल पण भावनिक आहे.आजही शेवळाची भाजी खाणं हा एक सामुहिक आनंद सोहळा आहे.
तर गद्रे आणि मोहिले याविषयी आपण बोलत होतो.
मोहिल्यांची चारू ही माझी अतिशय जिवलग मैत्रीण. तिचे भाऊ शरद, अरुण शेखर हेही मित्रच होते. शेखर तसा खूप लहान होता आणि तो माझी धाकटी बहिण छुंदा हिचा अत्यंत आवडता मित्र होता याविषयीचा एक गंमतीदार किस्साही आहे. तोही आपण या माझ्या जीवन प्रवासात वाचणार आहोतच.
चारुच्या वडिलांना भाई आणि आईला ताई असेच सारेजण म्हणायचे. भाई हे अत्यंत श्रद्धाळू आणि धार्मिक होते. साईबाबांवर त्यांची नितांत श्रद्धा आणि भक्ती होती. ते कोणत्यातरी सरकारी कार्यालयात नोकरीला होते. पगार बेताचाच पण तरी चार मुलांचा प्रपंच ते नेटाने सांभाळत होते. त्या वयात आम्हा मुलांना त्यांच्या प्रापंचिक समस्या जाणवत नव्हत्या. कधीतरी ताई आणि भाईंची झालेली भांडणं, शब्दांची आणि भांड्यांची आदळआपट ऐकू यायची त्यावेळी चारू आमच्याकडे किंवा समोरच्या मुल्हेररकरांकडे जाऊन बसायची. गल्लीतली आम्ही सगळीच मुलं अशावेळी एकत्र असायचो. कधी ना कधी हे प्रत्येकाच्या घरी घडायचं आणि त्यावेळी नकळतच आम्ही सारी अजाण,भयभीत झालेली मुलं अगदी जाणतेपणाने एकमेकांसाठी मानसिक आधार बनायचो.
भांडण मिटायचंच. तो एक तात्पुरताच भडका असायचा. नंतर ताई निवांतपणे घराच्या पायरीवर येऊन बसायच्या आणि भाई जोरजोरात टाळ्या वाजवत साईबाबांची आरती म्हणायचे
।।माझा निजद्रव्य ठेवा
तुम्हा चरण रजसेवा
मागणे हेचि आता
तुम्हा देवाधिदेवा।।
आजही ही आरती म्हणताना माझ्या डोळ्यासमोर सहजपणे टाळ्या वाजवणारे भाई येतात.
गल्लीत अण्णा गद्रे आणि गद्रे वहिनी हे जोडपंही तिथल्या संस्कृतीत सामावलेलं होतं. अण्णांचा दूधाचा व्यवसाय होता. मला आता नक्की आठवत नाही पण त्यांचा आणखी काही जोडधंदाही होता. अण्णांची मिळकत चांगली होती, काही जण गमतीने अण्णांवर टीका करीत. “गद्र्यांचा काय पाण्याचा पैसा”
दुधात पाणी घालून ते विकायचे म्हणून हा प्रहार असायचा.
वहिनी ही गोऱ्यापान, गुबगुबीत आणि हिरवट घारे डोळे असलेल्या एकदम टिपिकल कोब्रा महिला आणि घट्ट काष्ट्याचे लुगडं नेसलेल्या, ठुमकत चालणाऱ्या आणि आपण कोकणस्थ ब्राह्मण असल्याचा एक गर्व चेहऱ्यावर घेऊन वावरणाऱ्या वहिनी मला आजही आठवतात. त्यांच्या हातच्या ताकाची चव मी कधीही विसरू शकणार नाही. पण त्यांच्याविषयी आता जेव्हा माझ्या मनात विचार येतो तेव्हा तीव्रतेने एक सलही बोचतो. या गद्रे दांपत्यांना लागोपाठ तीन मुली झालेल्या होत्या.
विजू, लता, रेखा. आम्ही साऱ्या अगदी गाढ मैत्रिणीच होतो. या तिघींना आण्णांचा अतिशय धाक होता.अण्णांचं मुलींवर प्रेम नव्हतंच असं काही मी म्हणू शकत नाही पण एक मात्र खरं की त्यांना मुलगा हा हवाच होता. मुली झाल्या म्हणून ते नेहमी दुःखीच असायचे. रेखाच्या पाठीवरही त्यांना एक दोन कन्यारत्नं झाली पण ती काळाने हिरावून नेली. त्यांना मूठमाती देऊन अण्णा जेव्हा घरी येत आणि डोक्यावरून आंघोळ करत तेव्हा त्यांना कुठेतरी सुटल्याची भावना वाटत असावी. वहिनी काही काळ मुसमुसत कदाचित त्यांच्या मातृत्वाला झालेली जखम थोडी भळभळायची. गल्लीतली मंडळी मात्र म्हणायची “मुलगी जन्माला आली आणि अण्णांनी तिला अफू पाजली”
हे खूप भयंकर होतं पण त्यावेळी याचा अर्थ कळायचा नाही. खरं की खोटं हे ही माहीत नव्हतं पण या सगळ्यांमागे मुलीच्या जन्माचं दुःख होतं हे निश्चित आणि ते मात्र प्रखरतेने जाणवायचं,बोचायचं,प्रश्नांकित करायचं.
अखेर या दांपत्यास एक मुलगा झाला. त्याचे दणक्यात बारसेही झाले. गल्लीत अण्णांनी केशरयुक्त पेढे मन मुराद वाटले. आनंदी आनंद साजरा केला त्या मुलाचे नाव ठेवले मोरेश्वर आणि गल्लीत तो झाला सगळ्यांचा मोरया कधी मोरू, कधी मोर्या.
आणि अशा पार्श्वभूमीवर आम्ही पाच बहिणी होतो आणि माझी आजी अभिमानाने म्हणायची “माझ्या पाच नाती म्हणजे माझे पाच पांडव आहेत.”
वारीचं कुतूहल काही केल्या उलगडतच नाही .प्रत्येक गोष्टीच कौतुक वाटत राहतं .
मला तर ह्या वारकऱ्यांच्या पांढऱ्या कपड्याचा पण वाटतं ….
त्याविषयी विचारावं असं वाटलं. वारीला गेले होते तेव्हा त्यांच्याशी संवाद साधला .त्यातल्या काही जणांनी जे सांगितलं ते तुम्ही वाचा.
“आम्ही हे कपडे फक्त वारीलाच घालतो इतर वेळेस नाही”
“मला माझी बहीण घेऊन देते. तिच्या घरचं खटलं खूप मोठं आहे. तिला वारीला यायला कधीच जमत नाही. म्हणते…. तुला तरी कपडे घेते रे ….”
“माझी आई माझ्यासाठी शिवते. मशीन काम येत तिला.बघा ना “
असं म्हणून दादांनी उभे राहून पायजमा शर्ट दाखवला मला…
“हा बघा सोपाना याचा भाऊ याचं लय लाडकोड करतोय.. तोच देतो याला नवीन कापडं घेऊन”
“माझी बायको अंगणवाडीत शिक्षिका आहे. आमच्या गावी चांगली कापडं भेटत नाहीत. बायको तालुक्याला जाऊन माझ्यासाठी घेऊन येते.”
एक एक जण सांगत होते. मी ऐकत होते. एकानी तर सांगितले की …
वारकऱ्यांनी वारीत घातलेले हे कपडे दुसरे लोक आनंदाने मागून नेतात .कौतुकाने घालतात ….
हे ऐकून तर माझं डोळे भरून आले. किती निर्मळ श्रद्धा …त्या कपड्याचं पण अप्रूप असाव…
किती भक्तीभाव… आपली संस्कृती किती संवेदनशील आहे याचीच यातून आपल्याला प्रचिती येते.
लोकांना वारकऱ्यांच्या साध्या कपड्यातून सुद्धा विठ्ठलाशी जवळीक साधावीशी वाटते..
वारीला निघालेल्या आया बहिणी शेजारीच बसल्या होत्या. त्यांच्याकडे बघितलं सगळ्या जणींचे साधेसुधे कपडे होते. त्या आमचं बोलणं ऐकत होत्या. एकजण म्हणाली
“पुरुषांची गोष्ट वेगळी असते. त्यांना पाहिजेतच तशी कापडं… आमच्या बायकांचं काय हो ….वारीत यायला मिळालं याचाच आम्हाला आनंद होतो बघा …..इथं आमची कापडं कोण बघतंय?”..
शांत संयमीत आवाजात त्या बोलत होत्या. खऱ्याखुऱ्या वारकरणी होत्या. देहभान विसरून जातात या बायका……
श्रद्धा ,भक्ती आणि विठूरायावरचं अढळ प्रेम त्यांना चालण्याच बळ देतं.
त्यांच्या कपड्याकडे लक्ष जाण्यापेक्षा त्यांच्या आतल्या निर्मळ अंतःकरणाचे दर्शन मला झालं .
विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती डोक्यावर घेऊन ती उभी राहिली.
” कसं चालता हो इतकी जड मूर्ती डोक्यावर घेऊन ?मी विचारल
मागील काही भागातून आपण डार्कवेब बद्दल माहिती घेत आहोत. त्यात आपण याचा वापर कोण करते? सरकारचे त्यावर नियंत्रण का नाही तसेच डार्कवेबचा वापर करणे कायद्याने प्रतिबंधित आहे का याचा मागोवा घेतला. आज आपण त्यातीलच एक गोष्ट बघणार आहोत.
‘रेड रूम’
डार्कवेबचा विषय निघाला आणि रेडरूम बद्दल चर्चा झाली नाही असे सहसा होत नाही. ज्यांना डार्कवेब ही गोष्ट माहिती आहे त्यांना रेडरूम हेही माहित असते. अनेकदा तर लोकांना आधी रेडरूम बद्दल माहिती मिळते आणि नंतर त्याबद्दल जास्त माहिती घेताना डार्कवेब बद्दल माहिती मिळते.
सर्वप्रथम ही ‘रेडरूम’ काय भानगड आहे ते पाहू. होय… भानगडच. कारण रेडरूम बद्दल तुम्हाला जी माहिती मिळेल त्यानुसार, रेडरूम म्हणजे अशी जागा ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीवर अत्याचार केले जातात किंवा त्याची हत्या केली जाते आणि ती घटना अनेक जण मनोरंजन म्हणून बघतात. थोडक्यात WWE मध्ये असते ना, दोन, चार जण एकमेकांना हातात येईल त्या गोष्टीने बदडतात आणि लोकांना ते बघण्यात आनंद वाटतो. इथे फक्त दोन गोष्टी बदलतात. पहिली गोष्ट म्हणजे इथे ज्या व्यक्तीवर अत्याचार केले जातात ती व्यक्ती सहन करण्याशिवाय काहीच करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे प्रेक्षक आपल्या घरी डार्कवेब इंटरनेटचा वापर करून आपल्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर हे सगळे बघू शकतात. या साठी ते दिलेल्या लिंकवर बीटकॉईन किंवा इतर एखाद्या डिजिटल करन्सीच्या रुपात पेमेंट करतात.
काही वेळेस तर असेही सांगितले जाते की यात तुम्ही दोन पध्दतीने भाग घेऊ शकतात. एक म्हणजे प्रेक्षक म्हणून. आणि दुसरे म्हणजे कोणत्या पद्धतीचा अत्याचार करायचा हे सांगून. हे सगळे लाइव्ह घडत असते, आणि हे बघण्यासाठी लोक हजारो / लाखो रुपये खर्च करतात.
आता कुणाला असे वाटेल की एखाद्या निर्बल माणसावर अत्याचार करण्यात किंवा पाहण्यात कुणाला काय मजा येत असेल? आणि त्यासाठी कुणी हजारो, लाखो रुपये कुणाला का देतील? हाच विचार माझ्याही मनात आला होता. पण डार्कवेबवर अशा लिंक दिसतात हे मात्र खरे आहे.
तुम्हाला आता रेडरूम म्हणजे काय हे थोडक्यात माहिती झाले असेल. आता याच्या पुढील प्रश्न. हे खरंच अस्तित्वात आहे का?
माझ्या मते अशा कोणत्याही रेडरूम डार्कवेबवर अस्तित्वात असणे जवळपास अशक्य आहे. का? कारण डार्कवेबचे काम करण्याची पद्धत. याआधीच्या भागात आपण पाहिले आहे की डार्कवेब क्लाइंट आणि सर्व्हर याची ओळख पटणे अवघड व्हावे यासाठी मास्किंग करत असते. त्यातून काही जण VPN चाही वापर करतात. त्यानुसार data अनेक वेगवेगळ्या आयपीवर पाठवला जातो. अशा अनेक ठिकाणाहून फिरत तो क्लाइंट पर्यंत पोहोचतो. इंटरनेटचा स्पीड लक्षात घेता अशा ठिकाणी लाइव्ह स्ट्रीमिंग कितपत शक्य आहे? म्हणजे टेक्निकली हे शक्य वाटत नाही. मग यात शक्यता कोणती असेल? तिथे एखादी लिंक देऊन झूम किंवा गुगलमिट सारख्या ठिकाणी सहभागी करून घेणे. पण इथे डार्कवेब वापरले जात नाही. डीपवेबचा यात वापर होऊ शकतो. ( गुगलमिट, झूम या गोष्टी डीपवेब प्रकारात मोडतात. कारण त्याचा वापर करण्यासाठी ज्याने अशी मिटिंग अरेंज केली असेल त्याची परवानगी लागते. )
रेडरूम बद्दल जर आपण कोणत्याही तज्ञाला विचारले तर त्याचे उत्तर असते, ‘मी याबद्दल ऐकले आहे पण कधीही रेडरूममध्ये गेलो नाही.’
काही जण आता असेही विचारतील की युट्युबवर तर याबद्दलचे अनेक व्हिडिओ दाखवले जातात. ते काय आहे? ते सगळे व्हिडिओ हे मुद्दाम बनवले जातात. किंवा अनेकदा वेगवेगळ्या चित्रपटातील क्लिपला ग्रेस्केल मध्ये ( म्हणजे black & white बनवून ) बदलून पोस्ट केले जातात. त्यामागे पोस्ट करणाऱ्याची मानसिकता ही थोडीशी मस्करी करण्याची किंवा आपल्याला काहीतरी जास्त माहिती आहे हे इतरांना सांगण्याची असते.
असे सगळे असूनही मग डार्कवेबवर ‘रेडरूम’ बद्दलच्या लिंक का असतात? किंवा चार दिवसात ‘रेडरूम’ सेशन होणार आहे अशी लिंक का आढळते?
याला दोन कारणे आहेत. त्यातील पहिले कारण म्हणजे काही जणांच्या मनात अशा विचित्र भावना निर्माण होत असतात. काहीतरी थ्रिल म्हणून ते अशा ठिकाणी रजिस्ट्रेशन करतात. पैसे भरतात आणि फसले जातात. ज्याला पैसे मिळाले तो नंतर गायब होतो. आपण कुणाला पैसे पाठवले हेच माहिती नसेल तर तुम्ही त्याला पकडणार तरी कसे? म्हणजेच फसवणुकीसाठी अशा लिंकचा वापर अनेक hacker करतात.
याचे दुसरे कारण म्हणजे अशा अनेक लिंक काही देशाच्या सुरक्षा यंत्रणाच बनवत असतात. अशा ठिकाणी जे लोक येतात त्यांची माहिती घेऊन त्यांना अटक केली जाते. हा एक प्रकारचा सापळा असतो. अनेक विकृत लोक या सापळ्यात अडकतात आणि त्यांना योग्य ते शासन किंवा समुपदेशन केले जाते.
अनेकदा डार्कवेब पेक्षाही विचित्र गोष्टी आपल्या सर्फेस वेबवर बघायला मिळतात. त्याचे साधे उदाहरण म्हणजे काही जण आत्महत्या करताना फेसबुक लाइव्ह करतात. काही गेम असे असतात की त्याचा उपयोग लहान मुलांना आत्महत्या करण्यास किंवा कुणाची हत्या करण्यास प्रवृत्त करतात. अनेक खेळांवर तर सरकारने बंदीही घातली आहे. आणि हे सगळे सर्फेस वेबवर चालते.
थोडक्यात ‘रेडरूम’ ही गोष्ट डार्कवेबवर प्रत्यक्षात अस्तित्वात असणे जवळपास अशक्य आहे.
मागील आठ भागांच्या लेखमालेतून डार्कवेब बद्दलची माहिती सोपी करून सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. पुढेमागे अशीच एखादी लेखमाला परत घेऊन येईन, तो पर्यंत रामराम… धन्यवाद…
☆ “बाप” एक माणूस….!! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆
एकदा “बाप” ही उपाधी मागे लागल्यावर सगळ्या मृदु, कोमल भावनांची मक्तेदारी बायकोच्या नांवावर करून हा माणूस कधी निर्विकार, मख्ख तर कधी कर्तव्य-कठोर मुखवटा धारण करून बसलेला एक खडक बनतो.
पोटच्या पोरांसाठी सतत कष्ट करणारा, त्यांच्यासाठी अनेक गोष्टी चुपचाप सहन करणारा, त्यांची कोड- कौतुकं पुरविण्यासाठी वेळप्रसंगी जीवाचा आकांत करणारा बाप, तसा आईच्या थोरवी पुढे दुर्लक्षितच पण त्याचे त्याला कधीच वैषम्य वाटत नाही. जाहीर कौतुकाची तर त्याला कधी अपेक्षाही नसते. आपली लेकरं आपल्यापेक्षा मोठी व्हावीत ह्या एकाच ध्यासापोटी आपला ‘बापा’चा कठोर मुखवटा सांभाळत त्याचे आयुष्य सरत असते….
पण एका समाधानाच्या क्षणी, हा मुखवटा गळून पडतो… अंतरंगामध्ये झुळुझुळु वाहणाऱ्या मायेच्या निखळ पाण्याचा थोपवून धरलेला झरा, मुलांच्या कर्तृत्वाची झेप पाहतांना जेंव्हा त्याच्या डोळ्यांचे बांध फुटून वाहू लागतो तेंव्हा त्याच्याच लेकरांना उमगतं की अरे, आपला बाप हाच खरा आपल्या आयुष्यातला “बाप माणूस” आहे ….!
अशा सगळ्या “बाप-माणसांना” त्रिवार वंदन..!!
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आयुष्य हे एक, न उलगडणार गुपित! हा कोष्टकाचा खेळ! सारीपाटाचा डाव! प्रत्येकाला खेळ मांडण्याची मुभा आहे. फासे टाकणे त्याच्या हातात असले तरी, नियतीचा डाव वेगळाच असतो. भगवान शंकर पार्वतीने निर्माण केलेला खेळ, आजतागायत चालू आहे. फक्त खेळणारे भिडू बदलत असतात. सारीपाट तोच आहे. हा खेळ ज्यांना जमला तो आणि ती रंगात गुंग होतात, रमुन जातात आणि येणाऱ्या पिढीला हा डाव सुपूर्द करतात. प्रारब्धाचे फासे ठरलेले असतात. खेळणाऱ्याला वाटतं आपण चांगल खेळत असतो. सारीपाटाला कट्टी असते (फुली मारलेली जागा ) त्यात एखादी सोंगटी गेली की तिला मारता येत नाही! ती बिनधास्त राहते. तसेच काही खेळाडू,कट्टीत राहून आयुष्याचा खेळ खेळतात. तस नियतीने बुहतेक ठरवलं असावं. काहींना खेळात सुंदर फासे पडतात, तर काहींना उलटे फासे पडतात. काहींचा डाव रडीचा असतो तर, काही जण खिलाडू वृत्तीने घेतात. प्रत्येकाला डाव खेळावाच लागतो. त्याशिवाय सुटका नाही. हे एक प्रकारचे युद्ध कौशल्यच म्हणावे लागेल.
सोंगट्या कोणत्याही रंगाच्या असोत, खेळाचे कौशल्य आणि तंत्र मंत्र अंगी सात करावे लागतात. काहीजण हा खेळ अर्धवट सोडून उठतात! खेळ म्हटल्यावर हार जीत पण स्वीकारवी लागतेच. त्याचे कडू गोड घोट पचवावे लागतात. खेळातील परिस्थिती कशी असेल सांगता येत नाही. त्या परिस्थितीला अनुसरून नाईलाजाने, फासे टाकावे लागतात. खेळात बाहेरचे कमी पण आतलेच शत्रू जास्त असतात. त्यांना सदैव सोबत घेऊनच हा बुद्धिबलाचा डाव आखावा लागतो.
काहीवेळा आयुष्य हे “समुद्र मंथन “आहे असच वाटतं! काळाचा वासुकी ( दोरी ) आयुष्याच्या मेरू पर्वताला गुंडाळून समुद्राला ढवळून काढतात. वासुकीच्या तोंडा कडील भाग हा पुरुषाकडे तर, शेपटीचा भाग स्त्रिया कडे! आयुष्याचे रुद्र मंथन करण्यात किती पिढ्या गेल्या हे त्या जगतपित्यालाच माहित! प्रत्येक जण हा सुख दुःखाचा खेळ खेळत जीवनाच सार्थक करून घेत असतात.
पण ह्या समुद्र मन्थनातुन सुख आणि दुःख ह्या खेरीज कोणतेही रत्न सापडत नाही. वेदना व्यथा ह्या सुखातूनच उत्पन्न होत असव्यात का ? हे न समजणारे कोडेच! प्रत्येक जण ह्या सुख दुःखाच्या विहिरीत उडी मारतोच! रुद्र मन्थनाचा हा खेळ अव्यांहत पणे चालू आहेच.
प्रकृती पुरुष हेच आदम ईव्ह वाटू लागतात. येथूनच आनंदाचे सफरचंद खाण्यात मशगुल होतात. भोग आणि उपभोग ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू ! स्त्री पुरुष म्हणजेच जग का ?
स्त्रियांच्या वाट्यालाच भोग आणि पुरुषांच्या वाट्याला उपभोग! हा कसला न्याय!
ही अशीच का सृष्टी रचना.
स्त्रियांचे दुःख स्त्रियानाच माहित. मग तो पुरुष स्त्री रोग तज्ञ डॉक्टर असला तरीही त्याला त्या वेदना कश्या कळणार! भोग उपभोगचे खेळ हे आनादी काळापासून चालू आहेत. वेदना व्यथा आहेत, म्हणून त्याला काळाचे मलम आहेच. प्रकृतीचा सोशिक पणा निसर्ग सृष्टीला मान्य होता, असं म्हणावे लागेल.
आजच्या युगात स्त्री शक्ती जागृत झाली, स्त्री शक्ती खूप पुढे गेली. प्रत्येक क्षेत्रात ह्या शक्तीने आघाडी घेतली व समाजाचा मनाचा केंद्रबिंदू झाली. तरीपण तिच्या वाट्याला आलेल दुःख सहजपणे पचवून पुढे जात राहिली.
असं असलं तरी स्त्री व पुरुष हे घटक एकमेकांना पूरक होत, काळाच्या यज्ञात समिधा अर्पण करीत हा जगण्याचा यज्ञ अखंड सुरूच ठेवला. हाच भातुकलीचा खेळ, सारी पाटात केव्हा रूपांतरीत होऊन, त्याच रुद्र मंथन कस झालं हे कळत पण नाही. आयुष्य हे असच असत का? सुख दुःख , हार जीत कुणाचीही होवो. हा जगण्याचा मंत्र सारी पाट डाव असो वा रुद्र मंथन हे कुणास चुकले आहे का ?
भातुकलीचा खेळ कसा मांडावा, सारी पाटात फासे कसे फेकावे, रुद्र मंथन हा आयुष्याचा आनंदाचा क्षण समुद्र मंथन नाही का वाटतं हा जगण्याचा यज्ञ त्यात पडणाऱ्या अहुत्या कळत न कळत काळाच्या पडद्या आड होत राहतात! हेच तर समाजाचे जगणे आहे देणे आहे.
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ पूर्णविराम म्हणजे अंत कसा असेल ? – भाग – २☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
6. डॉ मनीषा सोनवणे ही योगशिक्षक आहे. रस्त्यावर याचना करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात सुद्धा एक छान पहाट यावी, आनंद लहरी तरंगाव्या यासाठी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून रस्त्यावरील सर्व याचकांचा रस्त्यावरच योग अभ्यास घेतला.
हास्ययोगा घेऊन त्यांना थोडं हसवण्याचा प्रयत्न केला…!!!
रस्त्यावर चालणाऱ्या या योग अभ्यासामध्ये घराबाहेर काढलेल्या अनेक “आईंचा” समावेश होता.
मृत्यूचे अनेक पर्याय आहेत….
जन्म घ्यायचा तर आई शिवाय कोणताही पर्याय नाही… !
तुम्ही जगात कोणालाही भेटा…. आपल्याला नऊ महिने जास्त ओळखते, ती आपली आईच…!
या जगात सगळ्यात अडाणी कोण असतं तर ती आई… तिला हिशोब कळतच नाहीत..!
मुलांसाठी खाल्लेल्या खस्तांची नोंद ती कुठेही ठेवत नाही…
पण हि नोंद दिसते तिच्या रापलेल्या हातावर…! चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांवर.. !!
आईला हिशोब कळतच नाहीत.. तरीही जगातली सर्वात मोठी गणितज्ञ तीच असते.
कायम पोरांच्या सुखाची बेरीज करत, पोरांच्या आनंदाचा गुणाकार करते. भेगा पडलेल्या टाचा घेऊन, पदरात कायम भागाकारच घेऊन फिरते. आयुष्याच्या एका टप्प्यावर तिला मुलांकडून वजा केलं जातं. या टप्प्यावर मग ती “शून्य” होऊन जाते.
संकटाच्या काळात मूल जेव्हा “एकक” म्हणून जगत असतं; त्यावेळी आधीची चुकलेली सर्व समीकरणे पुसून, ती त्या “एकक” मुलाच्या मागे उभी राहते आणि त्याला दशक बनवते… शतक बनवते…. सहस्त्र बनवते…!
आई, शेवटी स्वतः मात्र शून्यच राहते…!!!
रस्त्यात सापडलेली आई नावाची “शून्ये” आपण पदरात घेत आहोत…!!!
उकिरड्यावर पडलेली, हीच शून्ये गोळा करता करता…. मीच कधी श्रीमंत झालो… मलाच कळलं नाही…!
अन्नपूर्णा प्रकल्प
पूर्वी भीक मागणारी काही दांपत्य… यांच्याकडून आपण जेवण तयार करून घेत आहोत… (पोळी भाजी वरण भात)
या जेवणाचा एक डबा रु 50 प्रमाणे आपणच त्यांच्याकडून विकत घेत आहोत.
विविध हॉस्पिटलमध्ये अनेक गरीब लोक विविध योजनांखाली उपचार घेत आहेत परंतु त्यांना डबा आणून देणारे कोणीही नाही. अशा निराधार आणि निराश्रीत लोकांपर्यंत हे डबे आपण पोचवत आहोत.
(रस्त्यात दिसेल त्याला “दे जेवणाचा डबा” असं आम्ही करत नाही, यामुळे ज्याला गरज नाही त्याच्याही हातात अन्न जाते आणि तो नंतर हे नदीपात्रात फेकून देतो.. अन्नाची नासाडी होते)
जेवणासोबतच पाण्याची बाटली आणि विविध सणासुदीला लाडू, पेढे, शिरा किंवा इतर तत्सम गोड पदार्थ त्यांना देत आहोत.
खराटा पलटण
माझ्याकडे अशा अनेक महिला आहेत ज्यांना भिक मागायची नाही, काम करायचे आहे परंतु अंगात कोणतेही कौशल्य नाही.
मी आदरणीय संत श्री. गाडगे बाबांचा भक्त आहे. गाडगेबाबा पूर्वी हातात खराटा घेऊन गावेच्या गावे स्वतः स्वच्छ करून, इतरांनाही करायला लावत असत.
हिच कल्पना कपाळी लावून आपण “खराटा पलटण” या नावाने प्रकल्प सुरू केला आहे.
यात याचक महिलांना हाताशी धरून दिसेल तो सार्वजनिक अस्वच्छ भाग आम्ही सर्वजण मिळून स्वच्छ करत आहोत.
या बदल्यात त्यांना पगार किंवा पंधरा दिवस पुरेल इतका किराणा देत आहोत.
आमच्या सोबत काम करणाऱ्या या 100 महिलांना आपण युनिफॉर्म दिले आहेत.
आज आपले हे लोक काम करून सन्मानाने जगत आहेत.
आपण आंबा खातो पण त्याची कोय कधीही जपून ठेवत नाही…
काही लोकांचं आयुष्य सुद्धा तसंच असतं….
त्यांची मुलं बाळ सूना नातवंड त्यांचा गर काढून घेतात आणि आयुष्याच्या शेवटी कोय म्हणून फेकून उकिरड्यावर फेकून देतात…
लोकांनी फेकलेल्या अशा कोयी आपण उचलत आहोत आणि पुन्हा त्यांना जमिनीत रुजवण्याचा प्रयत्न करत आहोत…
त्यांना खत पाणी घालून तुम्ही हापूसचं आंब्याचं झाड आहात… याची जाणीव करून देत आहोत !
मनातलं काही …..
टळटळीत दुपारी, कडाक्याच्या उन्हात तहानेनं जीव व्याकुळ झाला; की आपण दुकानातून वीस रुपयाची पाण्याची बाटली घेऊन तोंडाला लावतो.
याच टळटळीत दुपारी आणि कडकडीत उन्हात तहानेनं जीव व्याकुळ झालेल्या रस्त्यावरील निराधार निराश्रित याचकांनी कुठे जायचं… ? पक्षी पाखरांनी कुठे जायचं…?
याचसाठी मार्च एप्रिल मे आणि मध्य जून पर्यंत आपण रस्त्यावर ठिकठिकाणी माठ भरून ठेवले होते.
पाणी भरण्याची जबाबदारी तिथल्याच एका याचकाला दिली होती.
पक्ष्यांसाठी नारळाच्या करवंट्यांमध्ये पाणी भरून ठेवलं होतं.
सुरुवातीला वाट्या घेऊन हे पाणी ठेवलं होतं… पण या वाट्या सुद्धा चोरीला गेल्या आणि नंतर माठही.
मला गंमत वाटते चोरांची… या बिचाऱ्यांना काय चोरावं तेच कळत नाही.
वाटी आणि माठ चोरून… ते विकून, किती पैसे मिळणार आहेत ? यातून किती आनंद मिळेल ??
चोरायचीच होती, तर एखाद्याची तहान चोरायची, एखाद्या तहानलेल्या मुखात पाणी घातलं असतं, तर त्यातून आयुष्यभर पुरेल इतकं समाधान मिळालं असतं.
स्वतःसाठी काही करून मिळवला जातो तो आनंद… परंतु दुसऱ्यासाठी काही करून मिळवलं जातात ते समाधान… !!!
आनंद थोडा वेळ टिकतो…. समाधान चिरकाल…!!!
माझ्या लेखांच्याही बाबतीत असंच होतं… माझ्या लेखांमध्ये काटछाट करून खाली स्वतःचे नाव टाकून अनेक लोक आपलाच लेख आहे, म्हणून बिनधास्त खपवतात, त्यावर नाटक काढतात, शॉर्ट फिल्म काढतात… त्यात माझ्या डोळ्यासमोर अनेकांना पुरस्कार मिळालेले मी स्वतः पाहिले आहेत, बातम्या वाचल्या आहेत.
असो; हा झाला त्यांचा तात्पुरता आनंद…!
पण माझे लेख चोरी करण्याऐवजी, माझं काम त्यांनी चोरी केलं असतं, एखाद्याची वेदना चोरी केली असती, तर मिळालं असतं ते आयुष्यभराचं समाधान… त्यांनाही आणि मलाही…!!! असो…,
मला अनेक वेळा विचारलं जातं, तुम्ही कोणत्या देवाची पूजा करता ? कोणत्या मंदिरात जाता ? की मशिदीत जाता ? की चर्चमध्ये जाऊन कॅण्डल लावता ??
मी या जगातला सगळ्यात भाग्यवान माणूस आहे…
माझ्या हाती स्टेथोस्कोप असतो, तीच माझी आरती… मी तोच ओवाळतो…!!!
दरिद्री नारायणाला, मी जी वैद्यकीय सेवा देतो तोच मी वाहिलेला नैवेद्य…
वेदनेनं तळमळणाऱ्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू हाच मला मिळालेला प्रसाद…
रस्त्याकडेला, फुटपाथ वर गलिच्छ अवतारात पडून माझी परीक्षा घेणाऱ्या प्रभुजींना, मी रस्त्यातच अंघोळ घालतो, तोच मी केलेला अभिषेक… !
देवा, तुझ्यावर लाखो लिटर दुधाचा अभिषेक घालण्याची माझी पात्रता नाही, औकात नाही…
पण ओंजळीत बसेल इतकं दूध घेऊन मी तहानलेल्या बाळांच्या मुखात नक्की घालतो… या बाळांच्या बोबड्या बोलात मी इतका रमतो की मला मंदिरात यायची आठवणच राहत नाही…. मला माफ कर देवा…!!!
थंडीत कुडकुडणाऱ्या लहान पोरांच्या अंगावर आम्ही चादर चढवतो… आणि म्हणून या अल्लाह, मस्जिद मध्ये कधी यायला जमलंच नाही… मुझे माफ करिये…!!!
प्रभू येशू, चर्चमध्ये लावायची कॅन्डल, आम्ही कोणाच्यातरी मनात लावून आलो आहोत… Kindly forgive me… !!!
गुरुद्वारामध्ये मांडायचा लंगर आम्ही रस्त्यावरच मांडला आहे …. वाहे गुरुजी…. मैनु माफ कर दो…
आणि म्हणून मंदिर, मस्जिद, चर्च आणि गुरुद्वारा यापैकी कुठेही जायला मला जमतच नाही…!
ही जी पूजा मांडली आहे, या पूजेचा तुम्ही सर्वजण अविभाज्य घटक आहात आणि म्हणून हा लेखाजोखा आपणास सविनय सादर !
शेवटी एका सुप्रसिद्ध वचनाचा आधार घेऊन म्हणावेसे वाटते, “मी त्या “देवाची” पूजा करतो ज्याला लोक “माणूस” म्हणतात… !!!”
(ही अतिशय महत्वपूर्ण माहिती देणारी लेखमाला दर सोमवारी आणि मंगळवारी प्रकाशित होईल)
मागील एका भागात मी म्हटले होते की, डार्कवेबला सगळ्यात जास्त फंडिंग अमेरिकन सरकार तसेच गुगल सारख्या काही कंपन्या करतात. आता अमेरिकन सरकार जर फंडिंग करत असेल तरी त्याचे नियंत्रण का नाही? याचे कारण आहे नेटवर्कची काम करण्याची पद्धत.
ज्यावेळी दोन किंवा त्यापेक्षा जास्त कॉम्प्युटर / मोबाईल किंवा इतर काही डिव्हाईस एकमेकांशी जोडले जात असतील तर त्याला नेटवर्क असे म्हणतात. अशा ठिकाणी एक कॉम्प्युटर हा माहिती मागवणारा आणि दुसरा माहिती पुरवणारा असतो. जो माहिती मागवतो त्याला क्लाइंट असे म्हणतात तर जो माहिती पुरवतो त्याला सर्व्हर असे म्हणतात. वेब कोणतेही असो, सर्फेस / डीप किंवा डार्क, त्याचे कामही असेच चालते.
सर्फेस वेबसाठी वापरले जाणारे सर्व्हर हे फिक्स असतात. ते कोणत्याही कंपनीचे असोत, त्याची नोंद डोमेन रजिस्टर करणाऱ्या ठिकाणी केलेली असते. म्हणून तर गुगलचे मेल याहूला जाऊ शकतात. किंवा रेडीफमेल वरून जीमेलवर मेल पाठवणे शक्य होऊ शकते. अशा ठिकाणी नियंत्रण ठेवणे शक्य असते. पण या उलट डार्कवेबचे असते. इथे निर्माण होणाऱ्या कोणत्याही सर्व्हरची नोंद कुठेही नसते. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही.
एक उदाहरण देतो. आजकाल आपण टीव्हीवर अपहरण कथा बघतो. त्यात अपहरण करणारे गुंड फोन करण्यासाठी एक साधा फोन घेतात, एक खोट्या नावाने सीम घेतात. त्यानंतर एखाद्या मुलाचे अपहरण करतात आणि त्या खोट्या नावाने विकत घेतलेल्या सीमवरून अपहरण केलेल्या मुलाच्या घरच्यांना फोन करतात. एकदा का त्यांना पैसे मिळाले की ते विकत घेतलेले सीम तोडून फेकून देतात. अशा वेळी पोलिसांना त्या गुंडांना पकडणे अवघड बनते. तीच गोष्ट इथेही असते. तिथे पोलीस गुंडांना पकडू शकतात कारण त्यात पैशाची देवाण घेवाण प्रत्यक्षपणे केली जाते. इथे तर व्यवहार देखील बीटकॉईन सारख्या क्रिप्टोकरन्सी मध्ये केले जातात. मग त्यावर नियंत्रण ठेवणार कसे?
अजून एक उदाहरण देतो. अनेकांनी नेटवर्किंगच्या LAN ( Local Area Network ) या प्रकाराबद्दल ऐकले असेल. मोठ्या कंपन्या किंवा ऑफिसमध्ये हा प्रकार अनेकांना बघायला मिळेल. तिथे एक सर्व्हर असतो त्यावर software install केलेले असते. त्याला इतर कॉम्प्युटर ( क्लाइंट ) जोडलेले असतात. क्लाइंटवर तुम्ही केलेले काम सर्व्हरवर सेव्ह होते. समजा अशा ठिकाणी तुम्ही एका क्लाइंटवरून दुसऱ्या क्लाइंटला काही संदेश पाठवला तर तो सरकारी यंत्रणेला माहिती होईल का? नाही होणार, कारण इथे इंटरनेटचा वापर झालेला नाही. LANचा वापर झालेला आहे. अशीच काहीशी गोष्ट डार्कवेब बाबतही लागू होते. उद्या समजा मी माझ्या कॉम्प्युटरवर एखादी .onion साईट बनवली आणि त्याची लिंक तुम्हाला पाठवली, आणि आपले कॉम्प्युटर इंटरनेटशी जोडलेले असतील तर तुम्ही त्या लिंकच्या आधारे माझ्या कॉम्प्युटरवरील ती साईट बघू शकाल. यावेळी तुमचा डिव्हाईस हा क्लाइंट असेल आणि माझा कॉम्प्युटर हा सर्व्हर. पण ज्यावेळी मी माझा कॉम्प्युटर बंद करेन, लिंक काम करणार नाही. इथे इंटरनेटचा वापर फक्त दोन डिव्हाईस जोडण्यासाठी केला आहे. अशा वेळी सरकारला आपल्यात काय संदेश दिले घेतले गेले हे आपल्या दोघांपैकी कुणा एकाच्या डिव्हाईसला hack केल्याशिवाय किंवा आपले डिव्हाईस त्यांच्या ताब्यात घेतल्याशिवाय समजू शकणार नाही. समजा माझा कॉम्प्युटर सरकारी यंत्रणेने hack केलाच आणि त्यावेळी मी VPN (Virtual Private Network) वापरत असेल तर जोपर्यंत सरकारी यंत्रणा माझ्यापर्यंत पोहोचतील, मी माझे स्थान बदललेले असेल. हीच गोष्ट आहे की डार्कवेबवर कोणतेही सरकार नियंत्रण ठेऊ शकत नाही.
आज आपण इथेच थांबू, पुढील भागात आपण डार्कनेटवरील ‘रेड रूम’ या प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत… तोपर्यंत रामराम…
☆ योग्य लेखन — लेखक : श्री अनिल विद्याधर आठलेकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
बोलत असताना किंवा लिहिताना केवळ शब्दच नाही तर अंकदेखील आपण चुकीचे उच्चारतो. नक्की कोणता आणि कसा उच्चार योग्य आहे हेच अनेकदा माहीत नसतं त्यामुळे असं होतं.
उदाहरणार्थ –
१९ = एकोणवीस
एकोणीस
४४ = चौरेचाळीस
चव्वेचाळीस
७८ = अष्टयाहत्तर/अष्टयात्तर
अठ्ठयाहत्तर
८८ = अष्टयाऐंशी
अठ्ठयाऐंशी
९५ = पंच्यांण्णव
पंचाण्णव
(संदर्भ : महाराष्ट्र शासन, ०६ नोव्हेंबर २००९ च्या आदेशानुसार )
क्रमवाचक संख्याविशेषणांच्या बाबतीत एक महत्त्वाचा उल्लेख –
पहिली चार क्रमवाचक संख्याविशेषणे अनियमित आहेत –
– पहिला/ली/ले/ल्या
– दुसरा /री/रे/र्या
– तिसरा/री/रे/र्या
– चौथा/थी/थे/थ्या
पाच अंकापासून मात्र पुढील सर्व अंकांना ‘वा’ हा प्रत्यय लागतो.
उदाहरणार्थ – पाचवा, सातवा, बारावा इ.
#महत्त्वाचा उल्लेख –
ज्या अंकात उपान्त्य ( सोप्या भाषेत – शेवटच्या अक्षराच्या आधीचं ) अक्षर दीर्घ (‘ई’) तर उपान्त्य अक्षर म्हणजेच ‘ई’ स्वर असणारे अक्षर र्हस्व होईल.
उदाहरणार्थ –
एकोणीस – एकोणिसावा
वीस – विसावा
बावीस – बाविसावा
(संदर्भ – मराठी शब्दलेखनकोश, प्रा. यास्मिन शेख)
तसे साधेच नियम आहेत, पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
मराठी आपली मातृभाषा आहे असं आपण म्हणतो. ती अभिजात भाषा म्हणून घोषित झाली पाहिजे अशीही आपली अपेक्षा असते, पण आपल्याच भाषेतील अशा छोट्या-छोट्या चुका टाळण्याच्या दृष्टीने आपण काही खास असे प्रयत्न करतो का?
बघा, विचार करा.
लेखक : श्री अनिल विद्याधर आठलेकर
प्रस्तुती : श्री सुहास सोहोनी
मो ९४०३०९८११०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈