मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘…पंढरीच्या वाटेवर’- वारीवर्णन : श्री सारंग कुसरे ☆ माहिती संग्रहिका आणि शब्दांकन : सौ राधिका-माजगावकर-पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘…पंढरीच्या वाटेवर’- वारीवर्णन : श्री सारंग कुसरे ☆ माहिती संग्रहिका आणि शब्दांकन : सौ राधिका-माजगावकर-पंडित ☆

आयुष्याचं गणित सोपं करून सांगणारी माणसं इथे वारीत भेटतात.

मनांत असलेली भक्ती, साऱ्या गात्रात भरभरून वाहणारी शक्ती घेऊन ‘ती’  पारूमाऊली दिंडीतून जरा बाजूला होऊन सावलीला विसावली.मिटल्या डोळ्यांपुढे सावळा पंढरी नाचत होता, ती त्याच्या पायाशी वाकली. आणि म्हणाली ,” किती नाचतोस ? दमशील नां रे बाबा ! थांब! मी तुझे पाय दाबते.असं म्हणून ती पुढे वाकली खरी, पण हे काय ? आपल्याच पायाला हा कोणाचा  स्पर्श ? डोळे उघडले तर एक हंसतमुख तरुण म्हणत होता , ” माऊली दमली असशील,अगं! मी वारीतला सेवेकरी.पंढरीला या वेळी नाही येऊ शकत. पण तुझ्या रूपात इथेच मी पंढरी पाहीन . पाय मागे घेऊ नकोस. तुझ्या फोड आलेल्या अनवाणी पायांना जरासं तेल लावतो. तेवढीच रखुमाईची सेवा केल्याचा आनंद.आणि तो पंढरीच्या वाटेवरचा तरुण सेवेकरी सेवेला भिडला.

अडचणीवर मात करून, आहे त्या परिस्थितीचा स्विकार करून विठ्ठल भक्तीची ‘आस ‘ तिची सेवा करून पूर्ण करणाऱ्या त्या सेवेकऱ्याच्या डोळयातली धन्यता फार मोठं भक्तीचे ‘ सार ‘ सांगून गेली.

आमच्या सन सॅटॅलाइट सोसायटीतले हुशार,अतिशय उत्साही, हौशी, परदेशवारी करून आलेले चिरतरुण श्री. सारंग कुसरे पंढरीच्या वारीत सामील झाले आहेत .त्यांचे अनुभव त्यांच्या कडून ऐकताना, अक्षरशः वारी डोळ्यासमोर उभी राहते. आणि आपणच पंढरीच्या वारीत सामील झाल्याचा आभास होतो . इतकं अप्रतिम वर्णन ते करतात.  कमी शिकलेल्या साध्या भोळ्या माणसांच्या, पण जगातलं मोठं तत्त्वज्ञान अंगीकृत बाणलेल्या, अनुभवसिद्ध ज्ञानाचं  खूप सुरेख वर्णन केलं आहे. श्री सारंग म्हणाले , ” छोट्याशा दुकानांत त्यांना पिठलं, भात,  चुलीवरची भाकरी मिळाली. त्या अन्नाला  पंचपक्वानांची चव होती. त्या माउलीला, “अन्नदात्री सुखी भव ” असें म्हणून तृप्तीची ढेकर देतांना त्यांनी विचारलं, ” मालक कोण आहेत या दुकानाचे ?   पुढे येत सांवळासा तरुण म्हणाला, ” माऊली मालक पंढरीला , विटेवर उभा आहे.मी नाही  तो आहे मालक .आम्ही  अवाक झालो, त्या भक्ती भावाने,  आणि त्याच्या बोलण्याने”.

पुढील वाटचालीत वारकऱ्यांची गैरसोय झाली.त्या गैरसोईला सामोरे जाताना  वारकरी म्हणतात . “अरे गैरसोईला सोय म्हणतो, गैरसोईतूनच सोय शोधतो तोच खरा वारकरी.”  गैरसोईतही पॉझिटिव्ह असलेले सारंग म्हणाले, “पैशाची रास करून गाद्या गिरद्यांवर लोळून जे समाधान मिळालं नाही तो आनंद चांदण्या मोजत, ‘ नीले गगन के तले ‘आम्ही, शाळेच्या पटांगणात झोपून लुटला.आणि साध्या सतरंजीवर शांत झोपलो.अंधाराकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या, अभंग,झिम्माफुगडी खेळणाऱ्या, अभंगावर नाचत ठेक्याचा ताल धरून आनंद तरंगात तरंगणाऱ्या या वारकऱ्यांकडे बघून मनांत येत,या श्रद्धायुक्त भक्तांकडे एवढा उत्साह एवढी ऊर्जा येते कुठून ?एका वारीतच आपण गार होतो. 18 वाऱ्या करणारे भाग्यवान पंढरीच्या वाटेवरून धावत असतात. श्री सारंग म्हणाले, “अभंगाशी ही माणसं इतकी तन्मय होतात आणि अभंग असे गातात की आपण त्या काळात केव्हां पोहोचतो कळतच नाही. प्रगल्भ विद्याविभूषित पंडित सुद्धा एक वेळ अडखळेल. पण न थांबता  टाळ् मृदंगाच्या ठेक्यावर  वारकरी म्हणतो, ” तुकोबाची कांता सांगे  लोकांपाशी..   गोसावी झाले गं माझे पती”आणि हे ऐकतांना तल्लीन झालेल्या सारंग ह्यांनी आपल्या मधुर आवाजात त्या ओळी गाऊन टाळ वाजऊन,सगळ्यांची वाह वा! मिळवली. स्रिची भावना 

स्रिचं ओळखू शकते हे लक्षात येऊन माझ्या मनात आलं, तुकाराम पत्नी जिजाऊंची मनातली व्यथा,आणि संसाराची कथा, व्यथेने भरली आहे. मातीच्या घरात गरिबीतही कोंड्या चा मांडा करून संसार करण्याची अगदी साधी अपेक्षा होती तिची. पण नवऱ्याच्या वैराग्याने गरिबीतही तिने हार नाही मानली.मनाला मुरड घालून तिने संसार केला.तुकारामांची कीर्ती जगभर पसरली. पण त्यांच्या यशामागे उभी असलेली ही अर्धांगिनी अंधारातच राहीली. नाथ असूनहीं ती अनाथ होती.कारण तुकारामाचे संसारात लक्षचं नव्हतं.एकतर्फी संसार चालवणाऱ्या त्या असामान्य मनोधैर्याच्या  माऊलीला माझा भक्तीपूर्ण नमस्कार.     मी म्हणेन खूप काही घेण्यासारखं होतं तिच्यापासून.

 विठ्ठल नामाचा गजर करताना  वारकऱ्यांची सगळी गात्र विठ्ठलाधिन होतात. वारकऱ्यांच्या मुखात अभंग असतात मग हात तर,टाळ वाजवण्यासाठी मुक्त हवेत ना? म्हणून धोरणांनी ते  वारीला निघताना शबनम  घेतात.सारंगना घरून  निघतांना प्रश्न पडला होता, मी बरोबर चप्पल घेऊ का स्लीपर?  झब्बा कुर्ता घेऊ की  सदरा?  छत्री की रेनकोट ? या प्रश्नमंजुषेत ते फिरत होते. तर तिकडे वारकरी विचार करीत होते मी कोणता अभंग म्हणू ? आणि कोणतं भजन गाऊ ? त्यातून बरेचसे अभंग अगदी तोंडपाठ होते त्यांचे. त्यातले काहीजण निरक्षर असूनही श्रवणशक्ती व तल्लख  मेंदूच्या जोरावर आणि विठ्ठल प्रेमावर ते भजनात तल्लीन व्हायचे. यासाठी कुठल्याही शाळा कॉलेजात जाण्याची त्यांना गरजच पडली नाही.जगाच्या शाळेत त्यांनी ही भक्तीची डिग्री मिळवली होती.

हम भी कुछ कम नही,’ असं म्हणून पुढे  असणाऱ्या बायकाही सेवेच्या बाबतीत मागे नसतात. अन्नपूर्णेच व्रत घेऊन कष्टाला भिडणाऱ्या वारीतल्या बायका,पोळ्या पिठलं भाकरी करून आपल्याबरोबर इतरांचीही पोटोबा शांती त्या करतात. दहा बारा पोळ्या  केल्यावर कमरेचे टाके ढीले होणाऱ्यांना त्या मोठ्या आकारात व मोठ्यां प्रमाणात पोळ्या करून पोटभर वाढून त्या  लाजवतात.आपल्या चार पोळ्या तर त्यांची एकच मोठी पोळी पाहून खाण्याआधीच खाणारा गार होतो. कारण त्या पोळीत रामकृष्ण असतो. विठ्ठल रखुमाई असते आणि अन्नपूर्णेचा वास असतो. प्रत्येक जण वारीत सेवाभावी असतो शक्ती प्रमाणे खारीचा वाटा उचलण्यात या भक्ती सागरात तरुणही न्हांहून निघतात. वयस्करांची हातपाय दाबून सेवा,रुग्णांना मलम पट्टी करणे,प्लॅस्टिक गोळा करून त्याची विल्हेवाट लावणे याआणि अशा कामांबरोबर अपंगांची, आंधळ्यांची ते काठी होतात. काही तरुण, वारकरी माऊलींना फुकट चार्जिंगची सोय करून देतात.वारकऱ्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या त्यांच्या घरच्यांना खुशाली नको का कळायला! म्हणून घरच्यांशी संवाद साधून देतात. इथे ‘स्ट्रगल’  असूनही  आनंद आहे. सकारात्मक विचारांची जोड आहे . नामस्मरणात दंग असल्याने कुविचारांना अति विचारांना इथे थारा नाही. कौन्सिलर ची गरज असते लोड गादीवर लोळणाऱ्या,रिकाम्या मनातल्या रिकाम टेकडयांना. ईथे निराश  व्हायला कुणी रिकामच नसत.विठ्ठल नामांत, विठ्ठल भक्तीत ते अखंड बुडाले आहेत . आणि म्हणूनच मला मनापासून खूप खूप कौतुक वाटतं ते सारंग सारख्या उत्साही तरुणांचं.परदेशात विमानाने सुखात आरामात प्रवास करण्याचा आनंद जितक्या तन्मयतेने त्यांनी घेतला तितक्याच समाधानाने त्यांनी हा खडतर प्रवास आनंदाने स्विकारला आहे.पुढील वाटचालीसाठी त्यांना आपण मनःपूर्वक शुभेच्छा देऊया. श्री.सारंग यांचे विचारही प्रगल्भ आहेत ते उत्तम शिघ्र कवी,कलाकार आहेत.त्यांच्या गाण्यात कमालीचा गोडवा असून बारकावे शोधून वारी वर्णन करण्यात  त्यांचं कसब अप्रतिम आहे. ते म्हणतात, “एकदा मनाने ठरवलं की सगळं होतं”. वारी प्रवास संपत आला, एक सुंदर गाणं आठवल त्यांना,…. दोन ओडक्यांची होते सागरात भेट.. त्याचे वारकरी त्यांना भेटले असतील. या जनसागरात वारकरी संप्रदायात त्यांना खूप खूप आनंद अनुभव,भरपूर ऊर्जा मिळाली. माणसातले देव  भेटले. चारीधामचा आनंद, पुण्य  मिळाल. माऊलीचा अतिशय सुंदर अर्थ त्यांना उमगला. सुरेख वर्णन धावपट्टीवरचंच होतं. ते पुढे म्हणतात, मा… म्हणजे मानवता. ऊ म्हणजे उदारता. आणि ली म्हणजे लिनता.. अतिशय सुंदर माऊली चा अर्थ सांगून श्रद्धेचा सुरेख सारीपाटच वारकऱ्यांनी आपल्यापुढे मांडला आहे. या सामान्य वाटणाऱ्या पण असामान्य बुद्धीनें, सकारात्मक विचाराने, जीवनाचा आनंद घेणाऱ्या,वारकऱ्यांना माझा   म्हणजे सौ.राधिकेचा शिरसाष्टांग  नमस्कार असो. …

मी पदवीधर आहे,खूप सुवर्ण पदके मिळवली आहेत. मला उच्च स्थान आहे. हा माणसांचा गर्व इथे वारकऱ्यांपुढे,  पंढरीच्या वाटेवर गळून पडतो… नतमस्तक होऊन मी म्हणते .धन्य ती माऊली.,धन्य ते तुकाराम, आणि धन्य धन्य ते पंढरीच्या वाटेवरचे वारकरी.  

 मंडळी आपणही विठ्ठल नामाचा गजर करूया. जय  जय राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. माऊली माऊली,

वारीवर्णन : श्री सारंग कुसरे

© सौ राधिका – माजगावकर – पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माणूस… कवी – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

सुश्री नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆ माणूस… कवी – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

आपण सध्याच्या युगात वेगवेगळे “डेज” साजरे करत असतो.आज १जुलै चा दिवस डॉ.बी सी.राय यांचा जन्म दिवस.. हा दिवस

“डॉक्टर्स डे” मानला जातो .   आजचा दिवस समाजातील वैद्यकीय व्यावसायिक लोकांप्रती आदरभाव व कृतज्ञता व्यक्त करण्याचा!! किमान या एका दिवशी तरी आपण सारे मनापासून,अंत: करण्यापासून त्या सर्वांप्रती व्यक्त होऊ या.

वैद्यकीय व्यवसाय हा थेट माणसाच्या जीवनाशी निगडीत असल्याने समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.

संपूर्णपणे  ज्ञानाधिष्ठित  असा हा व्यवसाय. वेळेवर व योग्य औषधोपचार झाल्यास संबंधित माणूस जगण्याची /आजारातून बरा होण्याची शक्यता निर्माण होते.बहुतांश डॉक्टर या पेशाकडे केवळ अर्थार्जनाचा व समाजात मानाने व प्रतिष्ठित पणे जगण्याचा दृष्टिकोन ठेवून जगत नसतात.तर एक माणूस म्हणून समाजासाठी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करण्यात आनंद मानत असतात.आपले विधित कार्य करत असताना डॉक्टर लोकांना ही समाजाने त्यांच्या विषयी काही भावना जपाव्यात असे वाटले तर त्यात गैर काहीच नाही.

पुण्यातील अनुभवी,ज्येष्ठ व प्रथितयश स्री रोग तज्ञ डॉ. निशिकांत श्रोत्री हे मान्यवर साहित्यिक ही आहेत.त्यांनी स्वतःच्या भावना “माणूस”या कवितेतून व्यक्त केल्या आहेत.

आज या कवितेचा आस्वाद घेऊ या. त्यातील भाव भावना, कवितेतील आंतरिक तळमळ ,कळकळ समजून घेऊ या. त्यातून कवीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही आपल्याला समजून येणार आहे.

☆ माणूस ☆

*

नका देऊ देवत्व मजला म्हणू नका राक्षस

भावभावनांतुन हिंदोळत साधा मी  माणूस

*

माझे ते जवळी होते अपुले जाणून

कोणाला ना दूर लोटले परके मानून

सेवा हे तर ब्रीद मानले आशा नाही फलास

कधि सावरलो कधी घसरलो परी ना हव्यास

*

देवपूजा करीत आलो मनात ठेवुन भक्ती

मानवसेवा माधवसेवा नाही मनी विरक्ती

मानवतेला कर्म जाणुनी मानिली न तोशीस

भुकेजल्या पाहुनी भरविला मम मुखीचा घास

*

निज आत्म्याचे दर्शन मजला सकलांच्या अंतरी

परमात्म्याची जाण काही नाही मजला जरी

सकल जनांच्या नेत्री मोद बघण्याचा ध्यास

अन्य काही आशा नाही रुचली मन्मनास

©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

रसग्रहण

“माणूस” हे कवितेचे शीर्षक कवितेचा विषय व आशय अगदी सुस्पष्ट करते. त्यामुळे वैयक्तिक माणूस म्हणूनही या कवितेशी आपला संबंध सहजपणे जुळून येतो. डॉक्टर श्रोत्रींनी जीवनाशी संबंधित अनेक भावनांना त्यांच्या कवितांमधून स्पर्श केला आहे .आज माणूस या कवितेतून ते त्यांच्या स्वतःविषयीच्या /स्वतःच्या मनातल्या भावना आपल्यासमोर मांडत आहेत. कवी पेशाने स्त्रीरोगतज्ञ आहेत .

अनेक स्त्रियांच्या प्रसुतीचे वैद्यकीय कार्य डॉक्टर या नात्याने त्यांनी  समर्थपणे पार पाडले आहे. अनेक वेळेला अडल्या-नडल्यांचे ते जणू देवच ठरले असतील किंवा तसे भासले असतील. तसेही वैद्यकीय

व्यवसाय हा संपूर्णपणे माणसाच्या जीवनाशी थेट निगडित असल्याने डॉक्टरांकडे “पृथ्वीवरील देव” या भूमिकेतून आपण  सर्वसामान्य जण बघत असतो. खरंतर असे देवत्व बहाल झाले असता /लाभले असता कुणी ही माणूस सुखावून जाईल,आनंदून जाईल.परंतु सत्याशी प्रामाणिक असलेला आणि जाणीवेने जाणींवाविषयी आणि जाणिवांशी बध्द असलेला डाॅ. श्रोत्री सरांसारखा कवी  माणूस या भूमिकेशी फारकत घेताना दिसतो.या विषयीचे विचार अत्यंत स्पष्टपणे कवीने कवितेतून मांडले आहेत.

नका देऊ देवत्व मजला म्हणू नका राक्षस

भावभावनांतुन हिंदोळत साधा मी  माणूस

मी केवळ डॉक्टर आहे म्हणून मला देवत्व बहाल करू नका असे कवी स्पष्ट करत आहे . कवी पुढे म्हणतो की कदाचित काही लोक ,काही माणसे यांच्या मते ते (डॉक्टर किंवा माणूस म्हणून ) राक्षस किंवा दानव ही असू शकतील. कारण काही वेळेला रुग्णाच्या भावनेशी ,परिस्थितीशी डॉक्टरांना काही घेणे दिले नसते असे समजणारे ही खूप लोक समाजात वावरत असतात. त्यांच्याकडे निर्देश करून कवी म्हणतो की असे जर वाटत असेल तर मला राक्षस मात्र म्हणू नका. मी देवही नाही व राक्षस ही नाही. तर मी एक सर्वसामान्य माणूस आहे ज्याने वैद्यकीय ज्ञान प्राप्त केले आहे .व त्या ज्ञानार्जनामुळे  वैद्यकीय व्यावसायिक म्हणून समाजात वावरत आहे, त्या दृष्टीने कार्यरत आहे. कवी पुढे म्हणतो की मी  सर्वांसारखाच भावभावनांच्या हिंदोळ्यावर  झुलणारा माणूस आहे.चांगले /वाईट ,भले /बुरे अशा भावनांना सामोरे जाणारा मी ही एक सर्वसामान्य माणूस आहे हे  अत्यंत स्पष्टपणे मान्य केले आहे..द्विधा मनस्थितीचा कदाचित खुद्द कवीला सामना करावा लागलेला असू शकतो हे सूचित केले आहे. मनात आलेल्या/ उद्धवलेल्या भावनांचा प्रांजळपणे / प्रामाणिक पणे स्वीकार करणे /ते मान्य करणे यासाठी मनाची एक विशिष्ट धारणा लागते ती या कवितेतून आपल्याला प्रत्ययास येते. खरंतर ही भावना व्यक्त करून कवीने आपण एक चांगला माणूस आहोत हे जाणवून दिले आहे. अशाप्रकारे देव नाही व राक्षस नाही परंतु एक अतिशय निरपेक्ष भावनेने वैद्यकीय क्षेत्रात काम करणारा माणूस म्हणून समाजाने आपल्याकडे पहावे अशी माफक अपेक्षा कवीने या ध्रुवपदातून व्यक्त केली आहे. ती सूज्ञ माणसाला नक्कीच रास्त वाटेल.

माझे ते जवळी होते अपुले जाणून

कोणाला ना दूर लोटले परके मानून

सेवा हे तर ब्रीद मानले आशा नाही फलास

कधि सावरलो कधी घसरलो परी ना हव्यास

कवितेच्या पहिल्या कडव्यातून कवी म्हणतो/ आपल्याला सांगतो की अपुले ज्यांना जाणले म्हणजे जे कवीला आपले वाटले व ज्यांना कवी आपला वाटला ते लोक कवीच्या नेहमीच जवळ होते. “अपुले” या शब्दावरील हा श्लेष अतिशय समर्पक आणि कवितेतील आशयाला पुष्टी देणारा. कवी मनाची प्रगल्भता व साहित्यिक जाण नेमकेपणाने दाखवणारा ही!!

कवीने सर्वांना अपुले जाणून जवळ केले, कुणालाही परके म्हणून दूर लोटलेले नाही . सर्वांना आपले मानून सर्वांशी एकसमान व्यवहार केला. त्यांना वैद्यकीय सेवा प्रदान केली ती रुग्ण आणि डॉक्टर या भावनेने व माणूस व माणुसकीच्या नात्याने सुध्दा.. हे सर्व करण्याचे  कारण म्हणजे समाजातील गरजू लोकांची सेवा हेच जीवन असे ब्रीद कवीने मानले आहे. अशा वेळी सेवा करेल त्याला मेवा मिळेल अशा आशयाची वृत्ती मात्र कदापी मनात ठेवलेली नाही .फळाची आशा मनात कधीच धरली नाही.”आशा नाही फलास” मधील दुसरा श्लेषात्मक अर्थ असा  की फळाला आशा लाभली नाही. कदाचित गरजू लोकांनी कवीच्या मनातील वैद्यकीय व्यावसायिक व माणूस म्हणून जगण्याची भावना जाणली नाही .तशा प्रकारे कधीतरी निराशाही वाट्याला आली असावी .कवी प्रांजलपणे कबूल करतो अशा वातावरणाचा/परिस्थितीचा सामना करावा लागला तेव्हा कधी तरी कवी त्याच्या निरलस मनोवृत्ती पासून दूर झाला.लोकांच्या वागणूकीने बैचेन झाला.तरी ही त्याने कुणाकडून कसली ही अपेक्षा केली नाही.त्याच्या ब्रीदापासून/ ध्येयापासून तो कधी थोडा  घसरला असला तरी बाजूला सरला  नाही.व कुठल्याही प्रकारचा हव्यास  मनात ठेवलेला नाही. निरपेक्षपणे /तटस्थपणे आपले सेवेचे कार्य कवीने अव्याहत चालू ठेवले.वर उल्लेख केल्याप्रमाणे या कडव्यात योजलेले दोन ठिकाणचे श्लेष अलंकार व जाणून,मानून तसेच फलास, हव्यास मधील यमक सुंदर तऱ्हेने  जुळले आहे.साहजिकच यामुळे कवितेला लाभलेली नादमयता मनाला मोहविते.अतिशय साधे,सहज सोपे शब्द पण अर्थ आशयपूर्ण आहे.

देवपूजा करीत आलो मनात ठेवुन भक्ती

मानवसेवा माधवसेवा नाही मनी विरक्ती

मानवतेला कर्म जाणुनी मानिली न तोशीस

भुकेजल्या पाहुनी भरविला मम मुखीचा घास

उच्च शिक्षण घेतले आहे किंवा माणसाला जीवनदान देण्याचे पुण्य किंवा मह्तकार्य करतो आहे अशी भावना मनात येऊन स्वतः देव असल्याची भावना कवीच्या मनात कधीच डोकावली नाही.करता करविता देव आहे ,जी अदृश्य शक्ती आहे तिच्या प्रती त्याने मनोमन श्रद्धा जपली आहे. त्याची मनापासून पूजा केली, त्यामागील खरा भक्ती भाव जपून ,जाणून व ठेवून .हे सर्व केवळ उपचार म्हणून नव्हे. स्वतःचे नेमस्त काम करता करता ते करण्याची प्रेरणा देणारा, ताकद देणारा जो ईश्वर त्याच्या प्रती अगदी मनोमन, खरेपणाने श्रद्धा भाव कवीने जपलेला लक्षात येतो.

मानव सेवा करता करता माधव सेवा म्हणजे कृष्ण सेवा/ कृष्णाची भक्ती ही केली.मानवसेवा हीच माधवसेवा म्हणजे ईशसेवा ही भगवान श्री सत्यसाईबाबांची सुप्रसिद्ध शिकवण कवीने आचरणात आणली आहे.पण महत्वाचे म्हणजे हे करताना मनाला विरक्तीची भावना मात्र जाणवली नाही.माणूस म्हणून जगण्याची ही प्राथमिक जाणीव कवीने  कसोशीने पाळली. रुग्ण सेवा करताना जरी कधी काही निराशा जनक प्रसंग उद्भवले असले तरीही त्यापासून दूर होण्याचा विचार चुकून सुद्धा कवीच्या मनात आलेला नाही. त्या क्षेत्रापासून/ त्या व्यवसायापासून विरक्ती घेण्याचा विचार कधीच मनात आलेला नाही. विरक्ती या शब्दावरील श्लेषही अतिशय सुंदर . आध्यात्मिक विरक्ती व व्यावसायिक विरक्ती असे हे दोन अर्थ अतिशय चपखलपणे येथे कवीने मांडलेले आहेत. त्यातील भावार्थाची सखोलता मनाला स्पर्शून उरणारी. व्यावहारिक पातळीवरील जीवन जगण्याचा आटोकाट व प्रामाणिक प्रयत्न कवीने केला आहे हे सहजपणे लक्षात येते.मानवतेला कर्म मानल्यामुळे त्या प्रतीचे कर्तव्य निभावताना कुठल्याही प्रकारची वेगळी तोशीस स्वतः ला लागत आहे अशी भावना कधीही कवीच्या मनात उद्भवलेली नाही. मानवतेचे कर्म हा कवीच्या जीवनाचा धर्म बनला.

“भुकेजल्या पाहुनी भरविला मम मुखीचा घास” या चरणातील “भुकेजल्या” या शब्दावरील श्लेष अतिशय मार्मिक व मर्मभेदी आहे. भुकेजला म्हणजे केवळ अन्नाच्या दृष्टीने नव्हे तर जो गरजवंत आहे, जो गरजू आहे ,ज्याला कुठल्या तरी प्रकारची भूक आहे तो भुकेजला असा व्यापक अर्थ येथे अभिप्रेत असावा असे वाटते. या ठिकाणी वैद्यकीय व्यवसायातील सेवेची ज्याला गरज आहे तो भुकेजला.. अशा व्यक्तिला सेवा तर दिलीच पण वेळ प्रसंगी स्वतःच्या मुखातील घासही भरवला. “मुखातील घास “या शब्द योजनेतील श्लेष ही अतिशय समर्पक आहे व विलक्षणही आहे. लौकिक अर्थाने “मुखीचा घास” म्हणजे कुणा गरजवंताला /भुकेल्या व्यक्तिला खायला देणे. असे करताना कदाचित देणाऱ्याला स्वतःच्या तोंडचा घास काढून भुकेल्या व्यक्तिला द्यावा लागेल.

येथे या बरोबरच दुसरा अर्थ असा की जी वैद्यकीय सेवा रुग्णाला प्रदान करुन  कवीने त्या बद्दलचा मोबदला म्हणून अर्थार्जन केले असते व त्याला स्वतःच्या व त्याच्याशी संबंधित इतरेजनांच्या मुखात घास घालता आला असता तो त्याने बाजूला सारला/ त्यागला म्हणजे मोफत रुग्णसेवा देली.

या दुसऱ्या कडव्यात ही वर निर्देश केलेले श्लेष अलंकार उत्तम. भक्ती, विरक्ती आणि तोशीस,घास मध्ये  यमक छान साधले आहे.

मानवसेवा,माधवसेवा मधील “मा”चा अनुप्रास लक्षवेधी आहे.साध्या , सोप्या व सुयोग्य साहित्यिक अलंकारांच्या वापरातून कवीने त्याच्या मनातली भावना अतिशय उच्च प्रतीवर नेऊन ठेवलेली आहे.

निज आत्म्याचे दर्शन मजला सकलांच्या अंतरी

परमात्म्याची जाण काही नाही मजला जरी

सकल जनांच्या नेत्री मोद बघण्याचा ध्यास

अन्य काही आशा नाही रुचली मन्मनास

तिसरे कडवे म्हणजे आचरणातली व आचरणाची परिसीमा ठरेल अशी.कवीने ही  भावना स्पष्ट पणे विशद / व्यक्त केलेली जाणवते. स्वतःच्या आत्म्याचे जो खरतर अदृश्य आहे पण त्याची जाण आहे आणि जो प्रत्येकाला प्रिय आहे  त्याचे दर्शन कवीला सगळ्यांच्या अंतरी झाले. सगळ्यांच्यात त्याने स्वतःला पाहिले . स्वतःचा  आत्मा प्रत्येकाला सर्वात जास्त प्रिय असतो.त्या विषयीची भावना /आसक्ती वेगळीच असते.तो भाव, तसे प्रेम इतरांच्या आत्म्यात पाहणे हे खरं तर दुरापास्त.. सर्व साधारणतः कुणी तो विचार ही करणार नाही.परंतु कवीने मात्र जाणीवपूर्वक तो विचार केला व प्रत्यक्षात आणण्यासाठी जीवाचे रान केले.अर्थात स्वतः कवी व इतरेजन यांच्यात भेदभाव केला नाही.स्वत:ला स्वतः साठी जे अपेक्षित असते तोच भाव आ‌जूबाजूच्या , संपर्कात आलेल्या लोकांसाठी ठेवला असा भावार्थ. इतरांच्या अस्तित्वाशी, त्यांच्या भाव भावनांशी अतिशय प्रामाणिक पणे तो समरस होऊन गेलेला आहे.हे सर्व घडताना कवी मान्य करतो की त्याला परमात्म्याची /ईश्वराची जाण जराही नाही. म्हणजे ईश्वराविषयी /त्याच्या अस्तित्वाविषयी त्याला ज्ञान नाही हे कबूल करण्याचा प्रामाणिकपणा कवीने बाळगला आहे /दर्शवला आहे.परोपकारी वागण्याने इतरांना आनंद दिल्याने परमात्मा प्राप्त होतो ,मोक्ष मिळतो अशी जन सामान्यांची समजूत असते.प्रत्यक्षात असे होते का, परमात्मा खरंच अस्तित्वात आहे का याची जाणीव कवीला नाही . अर्थात कवीने अशा प्रकारचा कुठला मोह मनात बाळगला नाही.स्वत:चा लाभ ही कल्पना ही कवीच्या हृदयात नाही.केवळ सद्भाव व  विवेकी विचारांना प्राधान्य देणे हे कवीने महत्वाचे मानले आहे.सर्वांच्या डोळ्यात आनंद बघणे ,सर्वांना सुखी बघणे हाच एक ध्यास कवीच्या मनाने घेतलेला आहे .इतर कसलीही आशा नाही .धन, संपत्ती, पैसा अडका, कीर्ती, प्रसिद्धी त्याच्या मनाला रुचलेली नाही .त्यांची आस नाही.केवळ या साऱ्या गोष्टींकडे पाहून कवीने रुग्णसेवेचे व्रत आचरले नाही.स्वत:च्या कृतीने दुसऱ्या च्या डोळ्यात आनंद पाहणे हा सर्वश्रेष्ठ आनंद आहे अशी कवीची मनोधारणा आहे.आयुष्यभर जतन केलेले तत्वज्ञान कवीने अंत:करणापासून आचरणात आणले आहे.विचाराला आचाराची जोड दिली आहे. “निज आत्म्याचे दर्शन मजला संकलांच्या अंतरी” हा चरण वाचताना श्री शंकराचार्यांनी विशद केलेला अद्वैतवाद प्रकर्षाने आठवतो.मी व समोरची व्यक्ती ही मीच अशी भावना/भूमिका कवीने निरंतर मनात जाणीवपूर्वक जपलेली आहे.व महत्वाचे म्हणजे तसेच आचरण ही कायम केले आहे.ते ही कुठल्याही प्रकारची स्वार्थ भावना मनात न ठेवता!! तसेच दुसरा श्लेषात्मक अर्थ आत्मा व परमात्मा ही एकच आहेत. त्यांच्या अस्तित्वाचा अद्वैत भाव कवीने जाणला आहे.म्हणून कवी स्पष्ट करतो की त्याला परमात्म्याची कुठल्याही प्रकारे जाण जराही नाही.कारण कवीने स्वतःचा आत्मा परिपूर्ण परिपक्व पध्दतीने जाणला आहे.त्या विषयी कसलाही, कुठलाही संदेह अगदी कणभर सुध्दा त्याच्या मनात नाही.त्यामुळे आत्म्याला जे योग्य वाटते,पटते ते कवी मनापासून करतो आहे.त्या आत्म्याला दुसऱ्याच्या डोळ्यातील आनंद पहाण्यात आनंद/मोद होत असल्याने त्याच्या वागण्यात बदल होत नाही.स्वत:च्या आनंदाच्या शोधात व तो प्राप्त करण्यात कवी मनापासून प्रयत्न करत आहे.असे वागताना साहजिकच दुसऱ्या आत्म्याला/परमात्म्याला (पर -दुसरा)ही आनंद लाभणार याची कवीला खात्री आहे.इतरे जनांना आनंद देताना आत्म्याला परमोच्च आनंद मिळणार हे कवी जाणून आहे.

या तिसऱ्या व अंतिम कडव्यात योजलेले श्लेष,यमक अलंकार अतिशय परिणाम कारक आहेत.कवितेतील भावनेला वाचकांपर्यंत समर्थ पणे पोहचवितात.

माणूस या संकल्पनेशी बांधिलकी जपत कवीने आयुष्यात आपला मार्ग कसा अनुसरला व त्यानुसार निरंतर मार्गक्रमणा केली हे या कवितेत सांगितले  आहे. स्वतःच्या जगण्याबद्दलचे व त्याविषयीच्या दृष्टिकोनाचे स्वरूप साध्या ,सुलभ पण तरीही परिणामकारक शब्दात कवीने व्यक्त केले आहे. जगण्याचा आशावाद आणि आदर्शवाद जपताना कवीने स्वतः एक आदर्श घालून दिला आहे असे वाटते, नव्हे  खात्री पटते.अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्ती/माणूस जर खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगला तर साऱ्या मानव जातीचे कल्याण/ हित व तदनुषंगिक संपूर्ण समाजाचे कल्याण होईल हे निर्विवाद. डॉक्टर श्रोत्री यांच्यासारख्या वैद्यकीय व्यावसायिक व्यक्तीने कर्म करताना त्यातील धर्म भाव सश्रद्ध भावनेने  कसा जगावा/जपावा याचा वस्तुपाठ घालून दिला आहे.वैद्यकीय व्यावसायिक व्यक्ती, जागरूक  कवी मन व या दोन्ही गोष्टींचा सुरेख संगम या कवितेत आपल्याला दिसून येतो..

जगण्याचा परिपूर्ण पाठ देणारी व आयुष्याला दिशा देणारी अशी ही कविता आहे. ही सर्व स्तरावर नक्कीच पोहोचली पाहिजे असे वाटते.

मला येथे आवर्जून एक निरीक्षण/मत नोंदवायचे आहे.रसग्रहणासाठी जेव्हा ही कविता पहिल्यांदा वाचली तेव्हा साधी, सोपी वाटली.तेव्हा  यात एवढा खोल व गहन अर्थ सामावलेला आहे हे लक्षात आले नाही.परंतु जसं जसं रसग्रहण लिहायला सुरुवात केली तेव्हा यात मांडलेला जीवनाचा /जीवन विषयक दृष्टीकोनाचा पैस ध्यानात आला..वरवर साधी वाटणारी ही कविता तिच्या अंतरंगात शिरल्यावर किती प्रांजळ, सुसंगत, सुसंवादी, सुसंस्कृत विचार धारा उलगडून दाखविणारी आहे हे लक्षात आले.ही जाणीव या कवितेचे बलस्थान आहे हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते.चांगल्या/उत्तम काव्याचे हे यश आहे हे निश्चित.. अर्थात याचे सर्व श्रेय कवीला!!

© सुश्री नीलिमा खरे

१४-६-२०२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शोध बकुळीचा… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

☆ शोध बकुळीचा… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

“या,बाई या,या बाई या

बकुळीच्या झाडाखाली फुले वेचुया

वेचलेल्या फुलांचा हार करूया

आणि कृष्णाच्या गळ्यात हार घालूया”

लहानपणी बाईंनी शिकवलेल्या या गाण्यावर अधून मधून आम्ही नाच करत असायचो.बकुळीच्या झाडाची प्रथम ओळख अशी झालेली.डोळ्यांपुढं ओट्यात फुलं वेचलेलं चित्र यायचं;पण बकुळ फुले कशी असतील?असं वाटायचं.सर्वसाधारण मोगऱ्याची फुले नजरेसमोर यायची आणि प्राजक्ताचं झाड डोळ्यांपुढं दिसायचं.पण बकुळ कधी दृष्टीस पडलं नाही.कलापथक पाहताना मात्र बकुळ,गुलाब,शेवंता अशी पात्रांची नावे असायची.शालेय पाठयपुस्तकात परत कधी बकुळीचा उल्लेख आला नसल्याने जरासा विस्मरणात गेलेला बकुळ पुन्हा

तारुण्यात

“बकुळीच्या झाडाखाली,निळ्या चांदण्यात,हृदयाची ओळख पटली,सुगंधी क्षणात..”

या ओळीं ऐकल्यावर पुन्हा ताजा झाला.या झाडानं जणू वेडच लावलं.डोळ्यांपुढं ते आकाश व्यापणारं झाड,त्याखाली बसलेले दोन प्रेमी जीव,फुलांचा सडा आणि अपरिचित सुगंध आला;पण ते झाड असं स्वप्नवतच वाटायचं.मोबाईल,नेट असलं काही नसल्याने ते सर्च करून बघण्याचा प्रश्न देखील नव्हता त्यामुळं कुठंही बकुळीचा उल्लेख आला की डोळ्यांपुढं मोठा वृक्ष आणि त्याचा खाली पडलेला सडा असं दृश्य यायचं.पुढं कुठंतरी वाचनात आलं की बकुळ झाड कोकणात असते, मग तर त्याला बघण्याची आशा मावळली.स्वच्छ सुंदर गाव स्पर्धेत हातनूर गावाची बातमी वाचत असताना बकुळीच्या झाडाचा उल्लेख आला.शाळेच्या कॅम्पेनिंगला गेल्यावर चौफेर,रस्त्याकडेला कुठं बकुळ झाड दिसतेय का बघितलं.पण ते झाड कसलं असतंय माहीतच नव्हतं त्यामुळं ते शोधूनही उपयोग नव्हता.  आता मोबाईल आल्यावर ‘दुर्मिळ झाडे व प्रजाती’ या फेसबुक ग्रुपवर बरीच झाडे,वेली ,फुले पाहण्याचा योग आला त्यातच बकुळीची फुलं न झाड बघायला मिळाले.

परवा अंगणात खारुताईने आकर्षक छोटी छोटी केशरी फळे टाकल्याचे बघितले पण ती कशाची असावीत ?कळले नाही.आमच्या कॉलनीत रस्त्याकडेला एकसारखीच झाडे बघून एकीला विचारलं,’ही एकसारखीच जंगली झाडं का बरी लावली असतील?’त्यावर ती म्हणाली,”अहो यातली दोन जंगली आहेत आणि बाकी बकुळीची आहेत?”काय?मला आश्चर्याचा धक्काच बसला.क्षणभर ‘युरेका!युरेका!करून ओरडावं की काय?असंच वाटलं.मी जवळ गेले.असंख्य कळ्यांनी नि केशरी फळांनी भरलेलं झाड बघून मला अत्यानंद झाला.मनात म्हणलं,”इतके दिवस तुला शोधत होते पण इतक्या जवळ असून देखील तू मला हुलकावणीच देत राहिलास  ते केवळ तुला कधी न पाहिल्यानेच!मस्त धुंद करणारा सुवास  घेतल्यावर वाटलं,देवघरात ही ओंजळभर फुलं ठेवल्यावर कशाला हवी कृत्रिम उदबत्ती?तसेही देवाने इतकी सुगंधित फुले निर्माण केली आहेत की खरेच त्याला उदबत्ती आवडत असेल का?हा प्रश्नही चाटून गेला.मला अगदी कृतकृत्य झाल्यासारखे वाटले.किती वर्षे याच्या भेटीसाठी वाट पहावी लागली!

“मधूघट भरले तुझ्या दारी,का वणवण फिरशी बाजारी?”

अशीच काहीशी माझी अवस्था!आता दररोज त्या कळ्या फुलण्याच्या प्रतीक्षेत होते.मन:चक्षुपुढे पुन्हा त्या असंख्य कळ्या फुलून झाडावर चांदण्या सांडल्याचे भासमान दृश्य आले.पण अति उन्हामुळं किंवा कमी पावसामुळं असेल,माझी ही मनीषा पूर्ण झाली नाही,मात्र दररोज सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळी झाडाजवळून जाताना मंद धुंद सुगन्ध भरभरून लुटताना मन कसं प्रसन्न,खुश होतेय!

याच जन्मात मला बकुळीचं झाड भेटलं न कविना त्याची भुरळ का पडली असावी याचं इंगितही कळलं.

आता पावसाळ्यात अंगणात बकुळ नक्कीच लावणार आणि कधीतरी ते असंख्य चांदणफुलांनी डवरलेलं झाड पाहण्याचं स्वप्न पुरं करणार.बघू,कृष्ण खरेच ते भाग्य भाळी लिहितोय का?

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दगडातला देव …” भाग – २ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “दगडातला देव …” भाग – २ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आज अचानक मीनाचा फोन आला “आहेस का घरी येऊ का?”

म्हटलं   “ये…”

जोशी काकांच्या कोकण ट्रीपला तिची ओळख झाली. व्हाट्सअप ग्रुप वर मेसेज असायचे.खर तर ट्रीप नंतर तिचा फारसा संबंध  आला नव्हता. व्हाट्सअप ग्रुप वर होतो तेवढच.. त्यामुळे आज ती घरी का येते हे कळेना…

मीना आणि अजून पाच जणींचा ग्रुप होता. जोशी काका वेगळं काही सांगायला लागले की त्या बोअर व्हायच्या. तिथून निघून जायच्या…. कॉमेंट्स करायच्या .

असू दे …..बरोबर आहे त्यांचं… सगळ्यांनाच कस आवडेल म्हणून आम्ही पण काही बोलत नव्हतो.

गणपती मंदिरात मीना माझ्या शेजारी उभी होती तिनी दगड ऊचलला

आणि म्हणाली..

“हे बघ नीता काही गणपती बीणपती दिसत नाही ऊगीच आपलं ..  काका काहीतरी  सांगतात आणि तुमचा लगेच विश्वास बसतो “असं म्हणून तो दगड माझ्या हातात देऊन ती   निघून गेली होती. 

मी तिचा आणि माझा दगड पर्समध्ये ठेवला होता.

ती येणार म्हटल्यावर आज हे आठवले….

तीचं काय काम आहे समजेना…

ती आली.

जरा वेळाने म्हणाली

” मी उचललेला दगड तू घरी आणला होता तो आहे का ग?”

“आहे माझ्याकडे..पण त्याची तुला आज कशी आठवण झाली?”

“नीता तुझा लेख वाचला आणि आम्ही जोशी  काकांना किती हसत होतो त्यांची टिंगल करत होतो हे आठवले. तुम्ही किंवा काका देव दिसला की  लगेच स्तोत्र,आरत्या काय म्हणता म्हणून आम्ही वैतागत  होतो …..काका उपदेश करतात म्हणून आम्ही त्यांची खिल्ली ऊडवायचो….

तुझा लेख वाचला आणि माझ्या वागण्याच मला खरंच वाईट वाटायला लागलं……

त्या माणसातला देव आम्ही पाहिलाच नाही….म्हणून आज मुद्दाम तुला भेटायला आले.”

“अगं होतं असं अनवधानांनी असू दे नको वाईट वाटून घेऊ…..ट्रीप मध्ये मजा ,गंमत करायची असं तुमच्या डोक्यात होत ..त्यामुळे तुम्हाला ते आवडत नसेल… “

मी तिची समजुत काढली.

“आणि अजून एक गोष्ट झालेली आहे ती तुला सांगते .माझ्या नातीचा गॅदरिंग मध्ये

“अधरं मधुरम् वदनं मधुरम्”

या मधुराष्टकावर डान्स बसवलेला आहे. ती ते  मनापासुन  ऐकत असते.तीचे ते पाठ पण झाले आहे. काल नातीने मला विचारले आजी तुला हे माहित आहे का? तेव्हा आठवले तुम्ही कृष्णाच्या मंदिरात हे म्हटले होते.”

“हो आठवले.तीथे कदंब वृक्ष होता.त्याची माहिती काकांनी सांगितली होती.”

यावर ती म्हणाली 

“आज मनापासून सांगते .जोशी काकांची माफी मागावी असं वाटलं. आता ते नाहीत म्हणून तुझ्याकडे आले.”

तीचे हात हातात घेतले.

थोड्या वेळानंतर तीचा दगड घेऊन आले.दगड तिच्या हातात देऊन म्हटलं

” एक सांगु का? यात बाप्पा शोधायचा प्रयत्न करूच नकोस .नुसती काकांची आठवण म्हणून ठेव .या दगडाकडे पाहून तुला ईतरही काही आठवेल आणि तेच खर महत्त्वाच आहे.तुझ्या विचारांमध्ये बदल झाला  आहे.ही या दगडाची किमया आहे. “

असं म्हणून तिच्या हातात तो दगड दिला

तिने तो आधी कपाळाला लावला आणि मग तो बघायला लागली……. …

आणि अचानक म्हणाली

“नीता मला गणपती दिसतो आहे…. अग खरच शपथ घेऊन सांगते..”

तिचे डोळे भरून वहात होते…

असचं असत ना…

अनमोल गोष्टी हातातून जातात आणि मग त्याचं महत्त्व आपल्याला..

 पटतं……

तसेच काकांसारखी माणसं आयुष्यातून जातात पण गेल्यानंतरही अशीच शहाणी करतात… विचारात परिवर्तन घडवून आणतात…

असू दे ….

अशी माणस आपल्या आयुष्यात आली हेही आपलं भाग्य म्हणायचं. आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून चालत राहायचं….

– समाप्त – 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डार्क वेब : भाग – 3 ☆ श्री मिलिंद जोशी ☆

श्री मिलिंद जोशी

? इंद्रधनुष्य ?

 ☆ डार्क वेब : भाग – 3 ☆ श्री मिलिंद जोशी ☆ 

(ही अतिशय महत्वपूर्ण माहिती देणारी लेखमाला दर सोमवारी आणि मंगळवारी प्रकाशित होईल) 

इंटरनेटचा वापर करणाऱ्या जवळपास ६०% लोकांनी डार्कवेबचे नावही ऐकलेले नसते. उरलेल्या ४०% लोकांपैकी जवळपास ८०% लोकांच्या मनात डार्कवेब बद्दल अनेक गैरसमज आहेत. माझ्याच क्षेत्रातील एका मित्राशी बोलताना डार्कवेब बद्दलचा विषय निघाला.

“तुला डार्कवेब बद्दल काय माहिती आहे?” त्याने मला विचारले.

“अगदी जुजबी माहिती आहे.” मी उत्तर दिले.

“बरंय… याबाबतीत जितकी कमी माहिती, तितके चांगले.” त्याने सांगितले.

“का?”

“अरे खूप भयंकर जागा आहे ती. मी तुला सांगू नाही शकत, मला काय काय अनुभव आले तिथे.” त्याने चेहरा गंभीर करत सांगितले.

“ओह… तरीही सांगच तू. बघू तरी मलाही तसाच अनुभव येतोय का.” मी म्हटले.

“म्हणजे? मी खोटे बोलतोय असे वाटते का तुला?”

“नाही यार… पण मला जाणून घेण्याची इच्छा आहे.”

“तुला सांगतो मिल्या… दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. मी नवीनच डार्कवेब बद्दल ऐकले होते. नेटवर अजून माहिती मिळवली आणि केले ना टोर ब्राउजर डाउनलोड. लगेच इंस्टाल मारलं. पण ते काय गुगल नसतं. आपण एखादी साईट सर्च केली आणि लगेच ती समोर आली.” इतके बोलून त्याने थोडा पॉज घेतला.

“आयला… मग रे?”

“मग काय? जवळपास अर्धा पाऊण तास घालवला, आणि मिळवले काही साईटचे पत्ते.”

“क्या बात है यार… एक नंबर.” मी त्याला दाद दिली.

“तुला सांगतो, कधी कधी तिथे कोणती भाषा असते तेच आपल्याला समजत नाही. आणि आपल्या समोर जी लिंक असते त्यावर क्लिक केल्यानंतर काय होईल हेही आपल्याला समजत नाही.” त्याने सांगितले.

“बापरे…”

“पण आपल्यात एक मुंगळा असतो, तो काय शांत थोडाच बसू देतो? मी त्या लिंकवर क्लिक केले मात्र, माझ्यासमोर काही विंडो ओपन झाल्या. त्या सगळ्या विंडोमध्ये वेगवेगळे माणसं दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर काहीही भाव नव्हते. सगळे अगदी हिप्नोटाईझ केल्यासारखे दिसत होते. आणि तुला खोटे वाटेल, त्यातील एका विंडोमध्ये मीही दिसत होतो.” त्याने सांगितले.

“आयला… डेंजरच…”

“तुला सांगतो… इतका घाबरलो मी, लगेच विंडो बंद केली. पण काही केल्या ती बंद होत नव्हती. मग हळूहळू त्यातून विचित्र आवाज येऊ लागला. माझी तर हालत पतली झाली. माझ्या चेहऱ्यावर घाम आला. आणि मग त्या माणसांच्या चेहऱ्यावर विचित्र हसू होते. मी लगेच लॅपटॉपचे पावर बटन दाबले. तरी तो बंद होईना. मग पावर बटन ५ सेकंद दाबून तो डायरेक्ट बंद केला.” त्याने सांगितले.

“बापरे… मग रे?”

“त्यानंतर एक दीड तास मी लॅपटॉपला हातच लावला नाही. पण जसा मी तो चालू केला, माझ्या समोर परत तीच स्क्रीन होती. तेच लोकं होते आणि मेसेज आला, ‘नाऊ यु आर ट्रॅपड्’…” हे सांगून तो माझ्या चेहऱ्याकडे बारकाईने बघू लागला. माझ्या चेहऱ्यावर थोडे हसू आले.

“तुला खोटे वाटते म्हणजे…” त्याने माझ्या चेहऱ्यावरील भाव ओळखले.

“नाही रे… खोटे वाटत नाही पण तू एक गोष्ट करायची ना… तुझ्या लॅपटॉपच्या कॅमेऱ्यावर बोट ठेवायचे. त्यांना काही दिसले नसते मग…”

“अबे येडे, पण माझा लॅपटॉप तर हॅक झाला ना…”

“होय… बरोबर…”

“म्हणून तुला सांगतो, कधीही तिकडे फिरकू नकोस…” त्याने सांगितले आणि मी मान हलवली.

आता अनेकांना वाटेल, खरेच का असे होऊ शकते? तर उत्तर आहे, ‘होय’… हे असे नक्कीच होऊ शकते. पण… अशी हॅकिंग आपल्या सर्फेस वेबवरही होऊ शकतेच की. म्हणून काय आपण सर्फेस वेब वापरायला घाबरतो का? नाही ना… बरे माझ्या मित्राने सांगितलेल्या कोणत्या गोष्टी आपल्या सर्फेस वेबवर होऊ शकत नाहीत? सगळ्याच होऊ शकतात. आपण झूम किंवा गुगल मिटिंग करतो त्यावेळी आपल्यासमोर अशाच अनेक विंडो येतात, ज्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक जोडले गेलेले असतात. आपण ज्यावेळी ती मिटिंग अटेंड करतो त्यावेळी आपला माईक, आपला कॅमेरा वापरण्याची परवानगी आपण त्या सॉफ्टवेअरला दिलेली असते. इथे फक्त एक गोष्ट जास्तीची झाली. आपण दिलेल्या परवानगीसोबत आपल्या सिस्टीमचा जास्तीचा अॅक्सेस ही वापरला गेला. थोडक्यात इथे सावधानी गरजेची आहे, भीती नाही.

अंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू ज्यावेळी ताशी १४५ किलोमीटरच्या स्पीडने येणाऱ्या बॉलचा सामना करतात त्यावेळी त्यांच्या मनात भीती असेल तर त्यांना खेळता येईल का? पण त्यांच्या मनात भीती नसते याचा अर्थ ते गार्ड / पॅड / ग्लोज / हेल्मेटचा वापर करत नाहीत का? करतात ना? तसेच या बाबतीतही असते.

डार्कवेब हा प्रकार जरी आपल्याला वेगळा वाटत असला तरी तो फारसा वेगळा नाही हेच या लेखातून मला सांगायचे आहे. बाकी गोष्टी पुढील भागात.

– क्रमशः भाग तिसरा  

©  श्री मिलिंद जोशी

वेब डेव्हलपर

नाशिक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रतिक्षा… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ प्रतिक्षा… ☆ सौ कल्याणी केळकर बापट

कुठल्याही व्यक्तीच्या जीवनात कठीण वा परीक्षा बघणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे वाट बघणं,प्रतिक्षा. कुठलीही आनंदाची गोष्ट अगदी अचानक मिळाली तर आपण ह्या “वाट बघणं”वा “प्रतिक्षा”फेजला सरळसरळ मुकतो. पण एखाद्या आनंदाच्या गोष्टीची मिळण्याची खात्री असेल तर ह्या फेजमधून आपल्या प्रत्येकाला हे जावंच लागतं. ह्या फेजला आपल्याआपल्या गमतीच्या भाषेत “धाकधूक वा पाकपुक होणं” असं म्हंटतो. पण खर सांगायच़ तर ह्या फेजमधून जाणं तसं अवघड असतं बघा. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे असं वाटतं ही फेज मेली संपता संपत नाही लवकर. असं वाटतं हा कालावधी खूप प्रदीर्घ आहे. असो

ही फेज आत्ता आठवायचं कारण म्हणजे आता नुकताच पावसाळा सुरू होतोय. तमाम शेतकरी वर्ग चांगल्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असतो.पावसाळा सुरू झाला म्हणजे पाऊस हा येणारच नक्की. त्यामुळे तमाम शेतकरी वर्ग घरातील,स्वतः जवळील असेल नसेल ते पणाला लावून पेरणी,मशागत करायला लागतो. त्याचे डोळे मात्र आभाळाकडे लागलेले असतात आणि मन चित्त सगळं वाट बघण्यात,पावसाच्या प्रतिक्षेत,अगदी चातक पक्षासारखं.

हल्लीची पिढी सुदैवी म्हणावी की नाही ह्या बाबतीत संभ्रमच आहे. कारण नशीबाने ह्या पिढीवर कुठल्याही बाबतीत वाट बघण्याची वेळ फार कमी येते,नशीबाने त्यांनी तोंडातून काढताक्षणी हवे ते मिळण्याचं भाग्य त्यांच्या नशिबी असतं. पण त्यामुळेच का होईना त्यांना वाट बघणं माहित नसल्याने कदाचित त्या मिळणाऱ्या गोष्टीची खरी किंमत ही कळतच नाही हे खरं. आणि ती गोष्ट मिळवितांना देणा-याला आणि घेणाऱ्या ला काय काय कष्ट पडतात हे त्यांचं त्यांनाच माहित.

प्रतिक्षा,सहनशक्ती,धीर संयम ही सगळी सख्खी भावंडच.कुठलिही गोष्ट मिळवितांना जरा प्रतिक्षा करावी लागली तर तिची किंमतही कळते आणि गोडीही जाणवते.ती गोष्ट मिळेपर्यंत धीर धरला,संयम बाळगला,तर आपल्याला पुढील वाटचालीत खूप लाभ हा होतोच.गोष्ट सहजासहजी मिळाली नाही तरी नाउमेद न होण्यासाठी सहनशक्ती कामी येते.

आताही पेरणी झालेल्या शिवारात आभाळाकडे डोळे लावून बसणा-या बळीराजाला बघितले की खरंच पोटात कालवाकालव होते.म्हणूनच त्याला एकाअर्थी बळीराजा हे नाव सार्थ ही वाटतं. असं वाटतं त्याची ही प्रतिक्षा लौकर संपावी व सगळी भुमी सुजलाम सुफलाम व्हावी.

आताही विदर्भात खास करून अमरावती जिल्ह्यात कडक उन्हाचा सामना करतांना अक्षरशः नाकी नऊ येणं म्हणजे नेमके काय हे समजले. परंतू आता कालपासून असं वाटतंय आता एक दोन दिवसांत प्रतीक्षा संपून पावसाच्या जलधारा नक्कीच बरसणार. त्याप्रमाणेच गुरुवारी पहाटे पहाटे थोडा का होईना पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा मिळाला.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दगडातला देव …” भाग – १ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “दगडातला देव …” भाग – १ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

जोशी काकांबरोबर कोकणातली  ट्रिप सुरू होती. संध्याकाळ झाली होती. आम्हाला जायचं होतं ते ठिकाण अजून लांब होत. 

अचानक एका देवळासमोर गाडी थांबली. आम्हाला काही कळेना.इथे का थांबलो?…. 

खाली उतरलो.काका म्हणाले

“गणपतीचे दर्शन घेऊया “

एक साधेच  नेहमी असते तसे देऊळ होते. दर्शन घेतले. 

काका म्हणाले “आता सगळेजण आपण इथे बसून अथर्वशीर्ष म्हणुया”

काकांच हे काय चालल आहे आम्हाला कळेना..

तेवढ्यात काकांनी खणखणीत आवाजात सुरुवातही  केली. 

“ओम भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा:..”

आम्ही पण सगळे म्हणायला लागलो..

“हरि ओम् नमस्ते गणपतये…”

अथर्वशीर्ष म्हणून झाल्यावर बाहेर आलो.

देवळाच्या आवारात छोटे छोटे असंख्य दगड टाकलेले होते आणि त्याच्या मधून छान  रस्ता केलेला होता.

काका म्हणाले

“या देवळाच्या आसपासचे हे दगड बघितलेत का?”

“दगड.”

“हो ..दगडच “

त्यात काय बघायचं ?..आम्हाला समजेना..

“तुम्हाला या देवळाची एक विशेष गोष्ट सांगायची आहे.

तुम्ही देवळाची प्रदक्षिणा करा आणि कुठलाही एक दगड उचला..

तो गणपतीच आहे…

अट एकच आहे फक्त एकदाच दगड उचलायचा…”

“म्हणजे?”

काका काय म्हणत आहेत हेच आम्हाला कळेना …त्यांनी परत सगळे सांगितले.

असं कसं असेल?

आम्हाला वाटल काका आमची मजा करत आहेत.

पण काका अगदी गंभीरपणे सांगत होते.

“स्वतः करून बघा तुम्हीच…”ते म्हणाले..

आम्ही प्रदक्षिणा करून आलो..

आता गंमत सुरू झाली.

कुठला दगड उचलावा हे कळेचना… आम्ही सर्वजण उभे होतो.

काका एकदम म्हणाले

“गणपती बाप्पा मोरया…”

आणि आम्ही प्रत्येकाने खाली वाकुन एक एक दगड उचलला.

प्रचंड उत्सुकता…. कुतूहल ….अपेक्षा….

दगडाच निरीक्षण  सुरू झालं…

आणि मग काय मजाच सुरू झाली….

प्रत्येकाला त्याच्या दगडात बाप्पा दिसायला लागला. तुझा बघु …. माझा बघ… प्रत्येकाने निरीक्षण केलं…

कोणाला डोळा दिसत होता ..कोणाला सोंड दिसत होती ..

काहीजण हिरमुसले… त्यांना बाप्पा दिसला नाही .मग कुणीतरी म्हटलं पालीचा आणि लेण्याद्रीच्या गणपतीचा  भास होतो आहे…..

कितीतरी वेळ आम्ही त्याच नादात होतो.

काकांनी परत एकदा गणपती बाप्पाचा गजर केला.आणि  म्हणाले 

“चला बसा गाडीत “पुढच्या प्रवासाला निघालो.. 

काही जणांना ती गंमत वाटली त्यामुळे त्यांनी तो दगड टाकून  दिला. तर काही जणांनी तो  दगड श्रद्धेनी बरोबर घेतला..

गाडी सुरू झाली आणि लक्षात आलं की मगाशी हळूहळू  गचके खात चालणारी   गाडी आता सुसाट चालली होती…

गाडी दुरुस्त झाली होती.

अरेच्चा अस होत तर….

तेवढा वेळ काकांनी आम्हाला गुंगवून ठेवले होते .आणि नकळतपणे आम्ही पण त्या खेळात रंगून गेलो होतो…

गाडी बिघडली… असे सांगितले असते तर आमचा हिरमोड झाला असता. आम्ही कंटाळलो असतो… त्यासाठी काकांनी ही युक्ती केली होती.

काकांना किती छान सुचलं नाही का?

विघ्न आलं…  संकट आलं की घाबरायचं नाही .आपलं लक्ष दुसऱ्या एखाद्या चांगल्या सकारात्मक  गोष्टीकडे लावायचं. त्यात मन रमवायचं ….काही वेळ जाऊ द्यायचा कदाचित प्रश्न सुटतातही….

पण एक मात्र सांगू का?

त्या दिवशी आम्हाला खरंच प्रत्येकाच्या दगडात थोडा का होईना देव दिसला…..

बस मधून उतरताना काका म्हणाले…..

“आज दगडातला देव बघितलात. आता माणसातला देवही बघत जा बरं का….. देवाशी वागता तस माणसाशीही वागुन बघा …”

आम्ही सगळे स्तब्ध झालो …

त्या छोट्याशा वाक्यातून काकांनी आम्हाला खूप काही सांगितले शिकवले….

हळूहळू आम्ही शिकत आहोत.

त्या गणपतीकडे बघितले की मला हे सर्व आठवते.

माझा तो दगड अहं …गणपती आता माझ्याकडे आहे.

मला त्यात बाप्पा दिसतो…

आज काका नाहीत ..

पण त्यांनी सांगितलेले जीवनाचे तत्वज्ञान तुम्ही पण लक्षात ठेवा हं..ते आयुष्यभर पुरणारे आहे…

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दुःखद सुख… – लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ दुःखद सुख… – लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

तंत्रज्ञान, बदलत्या प्रथा यामुळे बरच  बदलून जातं आणि अनेक गोष्टी, धंदे, माणसं हरवून जातात कालौघात. परवा काही कारणाने आळंदीला गेलो होतो तेंव्हा तिथे वासुदेव दिसला घाटावर. तसंही शहरात तो पूर्वी फार दिसायचा असं नाही पण धूमकेतूसारखा अधून मधून दिसायचा. पोलिसाचा किंवा इतर कुठला वेष घेऊन येणारे बहुरूपी तर आता दुर्मिळ झाले. सगळं खोटं आहे हे माहीत असलं तरी त्यांच्या मागून हिंडायला मजा यायची. वासुदेवाच्या टोपीत ती धूळ खालेल्ली मोरपिसं तो बदलतो कधी की तो मुगुट तो तसाच धुतो असा मला प्रश्न पडायचा. श्रावणात ‘आsssघाडा, दुर्वा, फुलं’ अशी हाक भल्या पहाटे यायची. ‘सुया घ्ये, पोत घ्ये, मनी घ्ये, फनी घ्ये’ अशी -हिदम असलेली हाळी तर किती वर्षात ऐकलेली नाही. आपल्या अंगणात फतकल मारून बसून गोधडी शिवून देणा-या बायका गायब झाल्या. 

अप्पा बळवंतला एका लाकडी फळीवर रेमिंग्टन, गोदरेजचे टाईपरायटर ठेवून वन प्लस फोर अशा कॉप्या काढणारे कधीच अस्तंगत झाले. त्यांची कडकट्ट चालणारी बोटं आणि कागद वर सरकवून परत पहिल्या जागी मशीन घेऊन यायचा स्पीड मी बघत बसायचो. स्टुलावर बसून मान पाठ एक करून कडेच्या कागदात डोकावत किंवा आधी मॅटर काय ते समजून घेऊन टाईप करून द्यायचे ते. कुठे गेले असतील, काय काम केलं असेल नंतर त्यांनी. लहानपणी मला कंडक्टर झालो तर खूप पैसे मिळतील असं वाटायचं. असतात एकेकाच्या विक्षिप्त कल्पना, मला कुठलाही धंदा बघितला लहानपणी की वाटायचं, हे काम जमेल का आपल्याला, यात साधारण श्रीमंत होण्याएवढे पैसे मिळत असतील का? जाकीट घालून रस्त्यात मिळेल त्या जागी बसून आपल्या कळकट्ट भांड्यांना ब्युटी पार्लरमधे नेऊन आणल्यासारखे कल्हई करणारे कल्हईवाले गायब झाले. लहानपणी चाळीत तो फकीर यायचा रात्री, हातातल्या धुपाटण्यावर ती उद आणि धुपाची पावडर फिसकारली त्याने की जो पांढरा धूर आणि वास येतो तो अजून विसरलेलो नाही.

रात्री दहाच्या सुमारास एकजण पान विकायला यायचा. मस्स्स्साला पान दहा पैसे, स्पेशल मस्स्साला पंधरा पैसे. जेमतेम अर्ध पान, चुना, काताचा, सुपारीचा तुकडा, बडीशेप, स्पेशल मधे गुलकंद अत्तर लावल्यासारखं असायचा. एकजण तळलेले पापड विकायचा. सणसणीत मोठे पापड असायचे, दहा पैशाला एक, पाच पैसे दिले तर अर्धा पापड. चोपटण्याने अंगण करण्यात मजा होती. एसटी स्टँडवर तांब्याची कानकोरणी घेऊन फिरणारे दिसत नाहीत आता. काय तन्मयतेने ते काम करायचे. भुयारातून काहीतरी नक्की निघणार अशा आशेवर असलेल्या इतिहास संशोधकासारखे ते कानात डोकवायचे. रस्त्यात कुठल्या तरी झाडाखाली मोठी पेटी घेऊन सायकल दुरूस्तीवाले बसायचे. दोन्ही बाजूला एकेक दगड ठेऊन तो हवा भरायचा पंप उभा ठेवलेला असायचा. एकेकाळी पीसीओच्या त्या चौकोनी ठोकळ्याबाहेर लोक रांग लावून उभी रहायचे. आतल्याचं बोलणं लवकर संपावं आणि माझ्यानंतर बाहेर कुणाचाही नंबर असू नये हे प्रत्येकाला वाटायचं.  

शाळेच्या बाहेर एक म्हातारी बसायची वाटे लावून, चिंचा, चन्यामन्या, बोरं, काळी मैना, भाजके चिंचोके, पेरू, बाहुलीच्या गोळ्या असायच्या. एक काला खट्टा, रिमझिम, ऑरेंज, लेमन, वाळा अशी सरबताची गाडी असायची. बर्फाचे गोळे विकणारे क्वचित दिसतात अजून. छत्री दुरुस्त करणारे कुठे गेले काय माहीत. एखादी टेकस मारली चपलेला तर पैसे न घेणारे पूर्ण पिकलेले चप्पल दुरुस्तीवाले आजोबा तर कधीच गेले. चार आणे तास मिळणारी सायकलची दुकानं गायब झाली. आपल्याला नको असलेले कपडे घेऊन चकचकीत भांडी देणा-या बार्टर सिस्टीम फॉलो करणा-या बोहारणी कुठे गेल्या असतील? सीताहरणाला कारण ठरलं म्हणून अंगात चोळी न घालता आपल्या पाटा, वरवंटा, जात्याला टाकी लावून द्यायच्या त्या वडारणी दिसणं शक्य नाही. कडेवर एक पोर आणि डोक्यावर विक्रीसाठी पाटा वरवंटा असायचा. त्या वरुटा म्हणायच्या त्याची मजा वाटायची. काही शब्द पण गायब झाले याची खंत वाटते. मायंदाळ, वळचण, हाळी, बैजवार, औंदा, बक्कळ असे अनेक शब्द असतील. मूळ विषय तो नाही, त्यावर परत कधी. 

‘बाई, तुझं मन चांगलं आहे, तू देवभोळी आहेस, मनात पाप नाही, दानी आहेस पण तुला यश नाही’ अशी पाठ केलेली कॅसेट लावणारे कुडमुडे ज्योतिषी कंटाळवाणी दुपार हसरी करायचे. चाळीत तुम्हांला सांगतो, वल्ली असायच्या एकेक. एका ज्योतिषाला ‘लग्न कधी होईल सांगा’ म्हणत दोघींनी हात दाखवला, त्याने पण सहा महिन्याच्या आत पांढ-या घोड्यावर बसून राजकुमार येईल एवढं सोडून सगळा सोनसळी भविष्यकाळ रंगवला. घसघशीत दक्षिणा मिळणार म्हणजे अजून घरं फिरायची गरज नाही हे त्याच्या चेह-यावर दिसत होतं. ‘तुझा मुडदा बशीवला भाड्या’ म्हणत त्यांनी आजूबाजूला खेळणारी आपापली पोरं दाखवली आणि त्याला हुसकवून लावलं. दक्षिणा बुडली त्यापेक्षा आपलं ढोंग उघडकीला आलं याचा राग त्याने मार बसणार नाही इतपत शिव्या देऊन काढता पाय घेतला. बाबाजी का बायोस्कोप मधे ‘मेरा नाम जोकर’मधे दिसला तेंव्हा आठवला. क्षणिक खेळ असायचा पण डोळ्यांभोवती दोन्ही हात धरून त्या नळकांड्यात डोकावण्यात अप्रूप होतं.   

फक्त दिवाळीला पोस्त मागणारे गुरखे नाहीसे झाले. रात्री फिरताना क्वचित दिसायचे. क्वचित येणारं कार्ड देणारे आमचे पोस्टमन इंदोंस अशी हाक मारायचे. आमचा पत्त्यातला चाळ नंबर कितीही चुकीचा टाकलात तरी पत्र यायचंच आमच्याकडे. त्यांनी कधीही आमच्याकडे पोस्त मागितली नव्हती. सायकलच्या मधल्या दांड्याला ग्राईंडिंग व्हील लावून मागच्या कॅरिअरवर बसून पेडल मारत चाकू, सुरे, कात्र्यांना धार लावणारे गायब झाले. आता भंगार कच-यात टाकतो पण आधी भंगारवाले यायचे, द्याल ते घायचे. प्लास्टिक बाटल्या, बरण्या, पत्र्याचे डबे, ते देतील ती किंमत. स्टोव्ह रिपेअरवाले एक वेगळीच गंमत असायची. दुरुस्तीत फार रॉकेल संपू नये ही काळजी असायची बाईला आणि हा बाब्या फारफार पंप मारून बर्नर तापवून लालबुंद करायचा. आतली काजळी काढून बर्नर फिट करून हवा भरून पिन मारली की बोर्नव्हिटा प्यायल्यासारखा स्टोव्ह झळाळता पेटायचा पण त्याचा आनंद अल्पकाळ साजरा व्हायचा आणि महिनाभर रॉकेल पुरवायला हवं या काळजीने ती बाई किल्ली सोडून पहिल्यांदा स्टोव्ह बंद करायची.       

या सगळ्यात रात्री दारोदार फिरून ‘अन्न वाढा हो माय’ म्हणणारे भिकारी नाहीसे झाले याचा मला आनंद आहे खूप. सगळे काही उपाशी मेले नसतील, जगण्यासाठी, पोटाची आग भागवण्यासाठी त्यांनी काहीतरी तजवीज केली असेलच. पण ती हाक बंद झाली ते बरं झालं. आम्ही चाळीत रहायचो तिथे रात्री साधारण नऊनंतर एक बाई यायची. तुम्ही द्याल ते ती घ्यायची. ती कुणाच्या दरवाज्यासमोर उभी रहायची नाही, सर्वसमावेशक अशी ती हाळी द्यायची, मग ज्याच्याकडे उरलं असेल तो तिला हाक मारून ते द्यायचा. पोळी, भाकरी, भातासाठी एकच पिशवी असायची. भाजी, आमटी जे काही असेल ते सगळं ती एकाच वाडग्यात घ्यायची. संतमहात्म्यांचे किस्से आपण ऐकतो की ते सगळं अन्न एकत्र करून खायचे पण इथे चव काय आहे यापेक्षा भुकेची आग मोठी होती. कालौघात काही गोष्टी नष्ट होतात ते बरच आहे. चांगल्या गोष्टी नाहीशा होतात या दुःखापेक्षा वाईट गोष्टी संपतात त्याचा आनंद जास्त असतो. 

ही किंवा आत्ता लगेच न आठवलेली माणसं हरवली म्हणून अडून काहीच राहिलं नाही पण गतायुष्याचा ती एक भाग होती. मागे वळून पहाताना काही नेमकं आठवतं तसंच भारंभार संदर्भ नसलेलं ही आठवत राहतं. त्या प्रत्येक गोष्टीशी काही ना काही तरी चांगली वाईट आठवण जोडलेली असते. माणसाला अमरत्व नाही हे वरदान आहे. किती गर्दी झाली असती नाहीतर. आयुष्याच्या प्रवासात अशा अनेक गोष्टी हरवतात. माणसं हरवतात ते वाईट. 

प्रत्येकजण या प्रवासात उतरून जाणार मधेच कधीतरी हे माहित असतं, काहीजण काही न सांगता घाईने उतरून जातात, काही लपून बसतात, काही दिसतात पण आपण त्यांना हाक मारू शकत नाही. न सांगता उतरून गेलेल्या, सोडून गेलेल्या, दुरावलेल्या, हरवलेल्या माणसांच्या आठवणींनी मन सैरभैर होतं. डोळ्यात नकळत पाणी दाटतं. अशावेळी काय करायचं? प्रवासात करतो तेच करायचं. खिडकीतून बाहेर बघायचं, हलकेच डोळे पुसायचे आणि दिसतंय त्यात हरवून जायचं. आपणही कुणाच्या तरी विश्वात त्यांच्या दृष्टीने हरवलेले असू शकतो या वाटण्यात पण एक दुःखद सुख आहे. 

आपल्यासारखंच कुणाच्या डोळ्यात पाणी असतंच की, माणसं काही फक्त आपलीच हरवत नाहीत.  

लेखक : श्री जयंत विद्वांस

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सासू सासरे नकोत – मग अनाथ मुलाशी लग्न करा… लेखिका : श्रीमती प्राजक्ता गांधी ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सासू सासरे नकोत – मग अनाथ मुलाशी लग्न करा… लेखिका : श्रीमती प्राजक्ता गांधी ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक 

मुलींनो,

तुम्ही तुमच्या आईबापाच्या काळजाचा तुकडा असता, तसा तुमचा नवराही खूप लाडा-कोडात वाढलेला असतो. त्यालाही कळा देऊनच आईने जन्माला घातलेला असतो. तुम्हांला वाटतं, तसं गटाराच्या बाजूने उचलून आणलेला नसतो.

लग्नापर्यंत तोही शिक्षण, करिअर, मित्रपरिवार यात छान बिझी असतो. तेव्हा संसार करायचा त्याचा अनुभव तुमच्या सोबतच सुरू होतो.

आईबापाच्या संसारात तुमचा जितका नॉमिनल रोल असतो, तितकाच त्याचाही असतो. त्याला सगळंच समजायला हवं, ही अपेक्षा आणि त्याला काहीच समजत नाही, हा तर्क दोन्ही अतिरेकी आहेत.

तुमची पाळी आल्यावर लगाबगीने तो तुमच्या उशा-पायथ्याशी बसेल, डोकं हातपाय चेपून देईल, अशी अपेक्षा करु नका. लाखो मुलांना असा काही त्रास असतो, हे माहीत नसतं. कारण त्यांच्या आईला (कदाचित्) तेवढा त्रास झालेला नसतो. तेव्हा गेट व्होकल. तोंड उचकटून सांगायचं, अमुक कर किंवा तमुक कर. सांगायचंही नाही आणि केलं नाही म्हणून तोंड पाडून बसायचं हे जमणार नाही.

नवऱ्याची आर्थिक लायकी काढताना, आपल्या बापाने आपल्याला काय लाईफस्टाईल दिलीय ते बघावं. आपण आपल्या हिकमतीवर काय करू शकतो ते आजमावावं आणि मग विषय काढावा.

तुम्ही जसं उंची, अनुरूपता, पगार, स्थावर जंगम इस्टेट, घरातलं स्थान बघून लग्न करता, तसं तो रुप, रंग, फिगर वगैरे बघून करतो. व्यवहार आहे तो. इमोशनल व्हायची गरज नाही. तुम्ही ठोकून वाजवून लग्न करणार आणि त्याने बघताक्षणी ‘हो’ म्हणावं, असं होत नसतं.

तुम्हाला तुमची आई प्रिय आहे, तशी त्यालाही त्याची आई प्रिय आहे. तुमच्या आईला जसा लेकीच्या संसारात इंटरेस्ट असतो, तसा त्याच्या आईलाही असतो. मुलगा म्हणजे काही देवीला सोडलेलं कोकरू नव्हे, विसरुन जायला. तो मजेत आहे न, त्याला काही त्रास नाही न, हे वेळोवेळी त्याचे आईबाप चेक करणारच.

सासूसासरे नक्कोच असतील, तर अनाथ मुलाशी लग्न करावं !

तुम्ही तासनतास आईशी बोलणार आणि तो दहा मिनिटं बोलला की तुमचा जळफळाट होणार, हे चालणार नाही. तुम्ही यायच्या खूप आधीपासून आई आहे त्याच्या आयुष्यात. तेव्हा शांत रहा. या मुद्द्यावरुन फालतू ब्लॕकमेंलिंग करु नका.

आईबरोबरच मित्र, मैत्रिणीही त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग असणार. त्या बाबतीत अडवणूक नको.

दळण, लाँड्री, स्वयंपाक, आला- गेला, स्वच्छता, आर्थिक बाबी, प्रवासाचं नियोजन इत्यादी बाबींत परफेक्ट नॉलेज असणाराच नवरा हवा असेल तर विधुराशी किंवा घटस्फोटीत मुलाशी लग्न करावं. त्यांना नक्कीच जास्त अनुभव असतो.

आणि परत एकदा, आपलं काय म्हणणं असेल, ते समोरून सांगावं. मुलांना आईने ‘मनातलं ओळखून दाखव बरं‘ सारखे फालतू गेम्स शिकवलेले नसतात. आणि हो, तुमच्या आईला त्याच्याकडून मान हवा असेल तर तुम्हीही त्याच्या आईशी नीट वागा.

खरे तर जनमानसात हा बदल होणे गरजेचे आहे.तेव्हाच मुलामुलींचे संसार खुशहाल  होतील व ते आनंदात राहतील.

लेखिका :श्रीमती प्राजक्ता गांधी

प्रस्तुती : श्रीमती उषा नाईक

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गुळभेंडी… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

☆ गुळभेंडी… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

नाव वाचून कुणाला तर वाटेल की हा भेंडीच्या भाजीचा गोड प्रकार असावा पण ग्रामीण भागातील लोक चटकन ओळखतील की हे झाड आहे. होय! पिंपळासारखी पण तळहाता एवढी रुंद, साधारण हृदयाच्या आकाराची पाने असणारे, रंगीबेरंगी फुलांचे आणि पिंपळासारखी घनदाट सावली देणारे गुळभेंडीचे झाड. लहानपणीचा आमचा सवंगडी.

उत्तर दक्षिण दरवाजे असणाऱ्या आमच्या कौलारू घराच्या प्रवेशद्वाराजवळ आत येताना उजवीकडे गुळभेंडीचे झाड आणि डावीकडे विलायती चिंचेचे झाड होते. घरात प्रवेश करण्या अगोदर भल्या मोठ्या अंगणातून  पायवाट होती अगदी अंगणाच्या मधोमध. अंगण या पायवाटेने दुभागले होते. दोन्ही बाजूला हिरवाई आणि मध्ये पाऊल वाट जी कट्टयाशी येऊन थांबायची. घराच्या समोर जवळ जवळ बारा बाय बाराचा दगड, माती मुरूम टाकून ठोकून ठाकून गुळगुळीत केलेला, सडा सारवण केलेला सुरेख कट्टा अन मग घर अशी रचना होती. अंगणातून घराकडे येताना दगडी पायऱ्या, नंतर कट्टा आणि मग घरासमोर एक पायरी व मग प्रवेश असे स्वरूप होते. हिरवाईत लपलेल्या एखाद्या चित्रातल्या कौलारू घरासारखेच आमचे घर होते त्यामुळं रस्त्यावरून येणाऱ्या जाण्याऱ्या लोकांना ते आकर्षित करायचे. भलं मोठं अंगण, त्याला काट्यांचे कुंपण, भली मोठी वेगवेगळी झाडं, फुले, वेली, भाज्या, गवत आणि भिरभिरणारी विविध रंगी फुलपाखरे!पावसाच्या पाण्यावर आमचं अंगण असं हिरवंगार दिसायचं. तर असंच एकदा आईने कुठूनतरी, मला वाटते मामाच्या गल्लीतून गुळभेंडीचे एक मजबूत दोन हात लांबीचे खोड आणले. एक छोटासा खड्डा खणून त्यात ते खोड लावलं आणि वर शेणाचा गोळा ठेवला. दररोज थोडं थोडं पाणी घालत राहिलो आणि एक दिवस इवलासा एक अंकुर बाहेर दिसला. लवकरच त्याचे रूपांतर पोपटी छोट्या पानात झाले. मग दुसरा तिसरा असे करत पाठोपाठ अंकूर फुटत राहिले. पावसाळ्यात मग छोट्या छोट्या फांद्या फुटत गेल्या आणि बघता बघता त्याचे उंच रोप झाले. त्या रोपाचं पुढं डेरेदार झाड झालं, बुंधा भक्कम झाला आणि भक्कम दाट सावली पडू लागली. शेतातून लांबून येणारे जाणारे वाटसरू बरेचदा झाडाखाली क्षणभर बसून पुढं जात. पावसात झाडाचा आडोसा घेत. उन्हातान्हाचे भारे घेऊन येणाऱ्या बायका चवळी, उडीद, मुगाच्या वेलींचे, गवताचे भारे झाडाखाली टाकून विश्रांती घेत. चेहऱ्यावर साचलेला घाम पदराने पुसत. तांब्याभर पाणी पीत, थकवा गेल्यावर मग भारा उचलून वाटेला लागत. अशी आईची न रस्त्यावरून येणाजाणाऱ्या बायकांची ओळख झाली. मग त्यातल्याच एकजणीला युक्ती सुचली. आमच्या शेळ्या बघून गावातील परटीन मावशी म्हणाल्या, “ही वज इतक्या लांब डोक्यावरन नेस्तोवर हितच झाडाखाली बसून आम्ही शेंगा तोडून घरी नेतो आणि वेल खातील तुमच्या शेळ्या. ” आईने पण होकार दिला. मग दरवर्षी त्या मावशी अशीच युक्ती करून डोक्यावरील भारा झाडाखाली टाकत. सावलीला बसून शेंगा तोडून भार हलका करून जात. अशा प्रकारे गुळभेंडीने अनोळखी माणसे जवळ आणली. भिकारी आकारी आला तर तिथंच सावलीत बसून आणलेलं सगळं शिळं पाकं मन लावून खायचा, त्याचे जेवून होईतोवर आम्ही त्याचे निरीक्षण करत असू. जेवल्यावर आम्हाला तो पाणी मागायचा पाणी पिऊन वाटेला लागायचा.

गुळभेंडीचा  हिरवा आणि पिकला पाला, फुले जनावरे खात. पावसाळ्यात दावणीला चिकचिक झाली की ती जागा वारसांडेपर्यंत म्हस गुळभेंडीला बांधत असू. उन्हाळ्यात उन्हाचा तडाखा वाढला की थंडगार सावली म्हणून सावलीत म्हस बांधायची. म्हस बोडून घ्यायची असल्यावर पण तिथेच बांधत असू कारण दावणी जवळ म्हस बोडली की थोडे तरी केस तिथंच राहणार आणि परत जनावरांच्या पोटात जाणार.

कावळ्या- चिमण्यांचे तर हक्काचे झाड होते गुळभेंडीचे. पर्णसंभार जास्त असल्याने पानात लपणे त्यांना सोपे असायचे. बरेचदा कावळे तिथं घरटे बांधायचे. बरेचदा इकडून तिकडून चोचीत काहीतरी घेऊन तिथं फांदीवर बसून निवांत खात राहायचे. त्यावेळी हमखास कावळा आणि कोल्ह्याची गोष्ट आठवायची. गुळभेंडीचे किती प्रकार आहेत?मला माहित नाही पण  दोन प्रकारची गुळभेंडी मी पाहिली आहे. एक रुंद पानांची आणि एक लांबट हृदयाच्या आकाराच्या पानांची. याचे खोड खरबरीत असते. लाकूड टणक आणि टिकाऊ असते त्यामुळं छपराला मेडकी करायला एकदम उपयोगी.

गुळभेंडीची फुले एकदम पिवळीजर्द आकर्षक असतात. सुकली की ती तांबूस होतात. गुळभेंडीच्या लंबगोल कळ्या आम्ही खेळायला घेत असू. कळीचा लांब देठ तोडून छोट्याश्या देठाला गर्रकन फिरवून गोल गोल भोवऱ्यासारखे फिरवायचो. दुसरी एक मज्जा करायचो. भोवऱ्याचा पाठीमागील देठ हळूच काढून मधला दांडा अलगद उपसायचो, तो ओलसर पिवळा असायचा, त्या रंगांच्या टिकल्या कपाळावर लावायचो. गंधाची बाटली म्हणून त्या भोवऱ्याचा  उपयोग करायचो. फुलं गळून गेली की त्यातून फळे येत त्याला टेंभर म्हणतात. ती टेंभरं सुकली की वाऱ्याने खाली पडायची. जनावरानी तुडवून किंवा गाडीखाली येऊन ती चिरडायची आणि त्यातून अंगावर मलमल असलेले चॉकलेटी बी बाहेर निघायचे. ते आकर्षक बी उगीचच वेचत बसायचो. बरेचदा त्या पानांची पिपाणी करून वाजवायचो. असं हे गुळभेंडीचे सर्वांगाने उपयुक्त आणि बहुगुणी झाड आमच्या सवंगड्यासारखंच होतं. त्याच्या घनदाट सावलीत तासनतास मातीत खेळत बसायचो.

परवा वाचनात आलं की गुळभेंडीची पानं, फळं औषधी आहेत. तसेच ते पंचप्लक्ष पैकी एक आहे. (१. वड, २. पिंपळ, ३. पिंपरी, ४. औदुंबर५. पारोसा पिंपळ अर्थात गुळभेंडी. )आणि मला गुळभेंडीने थेट आमच्या अंगणात सोडले. तिथून थेट मामांच्या परड्यात सोडलं. मामांच्या परड्यात तरी गुळभेंडीचा केवढा मोठा विस्तार होता!मामांच्या परड्यात चिंचेची न गुळभेंडीची सावली दिवसभर हटायची नाही त्यामुळं सगळ्यांची जनावरं रात्रंदिवस तिथंच बांधलेली असायची. आजीसुद्धा कायम त्या सावलीत बसलेली असायची. अजूनपर्यंत ते डेरेदार झाड परड्यात होतं. आता मात्र  प्रत्येकाचे वेगवेगळे संसार आणि गुराढोरासाठी अडचण वाटायला लागल्याने ते तोडले.

आमच्याही अंगणातले कधीच तोडले, हेच की आकर्षक घर बांधायला!

आमच्या आई-वडिलांना शेतीची हौस होती म्हणून त्यांनी रोजगार करत आपलं अंगण शेतासारखं जपलं. अंगणात उगवलेल्या प्रत्येक झाडाला आपलंसं केलं, त्याला हवं तसं मुक्त वाढू दिलं, ते बाभळीचे असो की लिंबाचे, भेदभाव नाही केला की त्यांचा द्वेष सुद्धा. म्हणूनच की काय झाडांचे ते प्रेम माझ्या मनाच्या तळात झिरपत झिरपत गेलं. प्रत्येक झाडाचं ऋण आज मोठं झाल्यावर कळत आहे. ती झाडं तिथं नाहीत पण आठवणी जिथं तिथं सांडलेल्या, त्या मात्र कितीही गोळा केल्या तरी ओंजळ भरत नाही.

रस्त्यावर एखादे गुळभेंडीचे झाड दिसले की  म्हणूनच मला किती आनंद होतो म्हणून सांगू!(तुम्ही म्हणणार त्यात काय आनंद होण्यासारख?)पण तुम्हाला कळणार नाहीच माझ्यातलं आणि झाडातलं ते गूढ हळवं नातं!!

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares