मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिंडी चालली, दिंडी चालली… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

दिंडी चालली, दिंडी चालली… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

काल पुण्यात पालखीचं आगमन झालं. वाहतूक काही वेळासाठी थांबली होती. लोक ती सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. मीही रहदारीचा अंदाज घेत होते. इतक्यात मला काही वारकरी लोकं गर्दीतून वाट काढत चालत जाताना दिसली. त्यांच्या सोबत हातात झेंडा घेतलेली दोन छोटी मुलंही होती. मोठ्या उत्साहात आणि आनंदात ती इतक्या गर्दीतूनही अनवाणी चालत होती. ते पाहून मला माझ्या शाळेतली दिंडी आठवली.

इयत्ता पहिली ते चौथी मी नवसह्याद्रीमधल्या ज्ञानदा प्रशालेत शिकत होते. त्यावेळीस आमच्या शाळेची दिंडी निघायची. शाळेपासून ते आजच्या राजारामपुलाच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात जायची. आजही निघतेच म्हणा. त्या दिंडीची आठवण झाली. आषाढी एकादशीला सकाळी सात वाजता आमच्या दिंडीला सुरुवात व्हायची. स्वच्छ धुतलेला गणवेश, हातात टाळ, झांजा, फुलं, तुळशीची रोपं, रामकृष्ण हरी असे लिहिलेले फलक असे आपल्याला हवं ते घेऊन दिंडीत सहभागी व्हायचो. शाळेत मोठ्या वर्गातल्या मुलांनी आणि शिक्षकांनी पालखी फुलांनी सजवून ठेवलेली असायची. त्यात ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतमंडळींचे फोटो असायचे. शाळेत छान रांगोळी काढली जायची. फुलांचा आणि उदबत्तीचा  मंद वास दरवळत असायचा. सगळे जमले की कोणी तरी शिक्षक जोरात म्हणायचे, “बोला पुंडलिक वर देव ! हारी विठ्ठल ! श्रीनामदेव तुकाराम ! पंढरीनाथ महाराज की जय ! टाळ, झांजा जोरात वाजू लागल्या की आम्ही चालायला सुरुवात करायचो. पावसाची रिपरिप, मधेच उन्हाची तिरीप आजूबाजूला आम्हा सर्वांचा हरिनामाचा गजर, मधूनच दरवळणारा मातीचा वास, झांजांचे, लेझीमचे खेळ, नाच सुरु व्हायचे. त्यावेळी आजच्या सारखा गाजावाजा करण्याची पद्धत नव्हती त्यामुळे शाळेच्या आसपासच्या लोकांना, विद्यार्थ्यांना आणि मंदिराच्या जवळच्या लोकांनाच या दिंडीची माहिती असायची. रस्त्यावरच्या गर्दीतून, वाहतूकीचा खोळंबा न करता वाजतगाजत ही दिंडी चालायची. मग अनवाणी चालताना मऊमऊ माती पायाला लागायची, तर कधी छोटे दगडही टोचायचे पण तेव्हा त्याचं काहीच वाटायचं नाही. रस्त्यावरून झेंडा फडकवत, टाळ, झांजा, लेझीमच्या गजरात ‘ज्ञानोबा माउली ज्ञानराज माउली तुकाराम’ असा गजर करत आम्ही अक्षरशः नाचत-गात जायचो.

मध्येच एखाद्या घरातून पालखीतल्या माउलींच औक्षण केलं जायचं. लोकं नमस्कार करायचे. आमच्या हातावर प्रसाद दिला जायचा. तहान लागली असेल म्हणून पाणी दिलं जायचं. तेव्हा बिसलेरी वैगरे प्रकार नव्हते आणि गरजही. अगदी गरज लागली तर ऐनवेळी आमच्यासाठी एखाद्या घरातलं स्वच्छतागृह देखील वापरायची सोय केली जायची. पण रस्त्यात कोठेही कसलाही कचरा किंवा घाण करायला सक्त मनाई असायची. आम्ही सारेजण ती शिस्त आवर्जून पाळायचो. एकमेकांचे हात हातात धरून एकसाथ एकसुरात विठ्ठल नामाचा गजर करताना एक वेगळाच उत्साह जाणवायचा. आम्हाला त्यावेळी ना विठ्ठल भक्तीची ओढ होती, ना कसलं मागणं होतं, ना या साऱ्यातलं काही कळत होतं. विठठलाच्या ताला-सुरात निरपेक्षपणे पावलं चालायची.

आता वाटतं तीच खरी भक्ती. जिथं काहीतरी मागायचं म्हणून सेवा नव्हती. केवळ आनंद होता एकमेकांसह चालण्याचा, गणवेशामुळं एक सारखे भासायचोच पण एकत्र चालणं, एकमुखानं गजर करणं, एकच अन्न वाटून खाणं आणि मुख्यत्वे दिंडीत जो कोणी सहभागी असेल त्याला आपला मानणं. लहानमुलं मोठ्या मुलाचं ऐकायचे, मोठी मुलं लहानांची काळजी घ्यायची. त्यांना चालताना, नाचताना मार्गदर्शनही करायची. कोणाला काही दुखलंखुपलं तर हे ताई-दादा काळजी घ्यायचे. अगदीच अडचण झाली तरच शिक्षक मध्ये पडायचे. ही एकी, हे प्रेम, हे नातं चार भिंतींपलीकडचं होतं. इथं जातपात, हुशारी, श्रेष्ठत्व काही काही नव्हतं. मला या दिंडीत सहभागी व्हायचं आहे हीच फक्त भावना होती आमचीही आणि आम्हाला साथ देणाऱ्या माणसांचीही.

आम्ही सगळे मंदिरात पोहोचलो की विठ्ठलाशी गाठभेट व्हायची मग आरती, भजन आणि प्रसाद असं भरगच्च कार्यक्रम असायचा आणि मग आम्ही आपापल्या घरी परतायचो ते विठठल विठ्ठल म्हणतंच. विठ्ठल देव आहे म्हणून नाही… तर आनंद मिळतो म्हणून… आमच्यासाठी विठ्ठल आहे तर दिंडी आहे… दिंडी आहे तर आजचा आनंदाचा दिवस आहे… हीच भावना मनात ठेवून…

आज या गोष्टींचा अर्थ वेगळाच वाटतो. आज विठ्ठलाचं स्मरण हेतुपूर्वक केलं जातं म्हणूनच कदाचित तो आनंद मिळत नसावा. विठ्ठलाची किंवा त्याहीपेक्षा म्हणा साध्यासाध्या गोष्टींतून आनंद मिळवण्याची वृत्ती आमच्यात रुजली ती मात्र या दिंडीमुळेच.

अलीकडची परिस्थिती पाहता असं वाटतं…

दोन्ही घरचा पाहुणा मी

राहिलो सदा उपाशी !

विठ्ठलाचे नाम जरी मुखाशी

प्रपंचाचा काटा रुते पायाशी !

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एका ‘भगोड्या’ ची गोष्ट – भाग-1— मूळ इंग्लिश – ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त) – मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆  एका ‘भगोड्या’ ची गोष्ट –  भाग-1 — मूळ इंग्लिश – ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त) – मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

१९७१ च्या युद्धात कामगिरी बजावल्यानंतरही आम्ही बराच काळ पाकिस्तान सीमेवरच तैनात राहिलो होतो. आमचे तोफखाना दळाचे चौदावे फील्ड रेजिमेंट, जून १९७३ मध्ये जमशेदपूरला आले. Adjutant या पदावर मी अजून नवखा होतो. अत्यंत ‘कडक’ अशी ख्याती असलेले लेफ्टनंट कर्नल रामचंद्र परशुराम सहस्रबुद्धे हे आमचे कमांडिंग ऑफिसर (CO) होते. 

जमशेदपूरच्या टेल्को कंपनीमध्ये कामाला असलेला एक माजी सैनिक, गुरबचन सिंग, एके दिवशी सकाळी मला भेटायला आला. तसा तो आमच्या युनिटमध्ये वरचेवर येत असे. माजी सैनिक असल्याने, रेशन, दैनंदिन वापराच्या वस्तू आणि दारूच्या बाटल्या आर्मी कॅन्टीनमधून विकत घेण्याचा हक्क त्याला होता. त्याकरिता आवश्यक ती कागदपत्रेही त्याच्याकडे होती. टेल्कोच्या सर्व माजी सैनिकांच्या वतीने त्यांचा कोटाही तोच घेऊन जात असे. 

पंजाब रेजिमेंटचे, कर्नल ब्रार नावाचे एक सेवानिवृत्त अधिकारी टेल्कोच्या प्रशासन आणि सुरक्षा विभागाचे जनरल मॅनेजर होते. गुरबचन सिंग हा त्यांचा ड्रायव्हर होता. टेल्को व टिस्कोच्या इतरही महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या मोटारीही तो क्वचित चालवीत असे. अर्थातच, एक निष्णात ड्रायव्हर असल्याने, टेल्को (टाटा मोटर्स) आणि टिस्को (टाटा स्टील) अश्या मातबर कंपन्यांसाठी तो एक मोलाचा कर्मचारी होता.  

आमच्या युनिटसोबत संलग्न असलेल्या, ‘इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनियर्स’ (EME) या विभागाच्या सर्व सैनिकांशी गुरबचन सिंगचा परिचय होता. तसेच, आमच्या रेजिमेंटचे नायब सुभेदार/सुभेदार पदावरील ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (JCO), आणि नाईक/हवालदार पदावरचे नॉन कमिशन्ड ऑफिसर (NCO), हे सगळेच त्याला ओळखत होते. 

एरवी त्याचा संबंध मुख्यतः आमच्या युनिटच्या क्वार्टर मास्टर (QM) सोबतच येत असल्याने, मी त्याला पूर्वी कधी पाहिलेले नव्हते. त्या दिवशी मात्र आमच्या QM ने गुरबचन सिंगला माझ्याकडे पाठवले, कारण त्याचे सर्व्हिस बुक एखाद्या सेनाधिकाऱ्याकडून सत्यापित करून घेणे आवश्यक झाले होते. 

गुरबचन सिंगची सर्व कागदपत्रे, आणि त्यालाही सोबत घेऊन आमचे हेडक्लार्क माझ्याकडे आले. माझ्या नावाचा व आमच्या युनिटचा शिक्का त्या कागदांवर छापणे आणि मी सही करणे, असे एखाद्या मिनिटात होण्यासारखे काम असल्याने, सर्व सज्जता करूनच हेडक्लार्क माझ्याकडे आले होते. परंतु, निव्वळ ‘सह्याजीराव’ बनून काम करणे मला मान्य नव्हते. 

मी गुरबचन सिंगच्या आर्मी सर्व्हिससंबंधी सखोल चौकशी केली. त्याने सांगितले की, तो पूर्वी EME मध्ये व्हेईकल मेकॅनिक (VM) होता. खात्री करून घेण्यासाठी, आमच्या लाईट रिपेअर वर्कशॉप (LRW) मधल्या VM ला बोलावून मी विचारले असता, त्यानेही मला सांगितले की प्रशिक्षणकाळात गुरबचन सिंग त्याचा बॅचमेट होता. 

ही सर्व चौकशी चालू असतानाच अचानक, CO साहेबांनी माझ्यासाठी बझर वाजवल्याने मला तातडीने त्यांच्याकडे जावे लागले.  

CO साहेबांच्या ऑफिसमधून परतल्यावर माझ्या मनात नेमके काय आले देव जाणे, पण मी गुरबचन सिंगच्या कागदांवर सही करण्यास नकार दिला. आमच्या युनिटचे सुभेदार मेजर आणि हेडक्लार्क हे दोघेही माझ्या निर्णयामुळे थोडेसे नाराज दिसले.

त्यानंतर मी हेडक्लार्कना आदेश दिला की, सिकंदराबादजवळील त्रिमुलगेरी येथे असलेल्या EME सेंटरमध्ये, गुरबचन सिंगची सर्व कागदपत्रे पाठवून, त्यांची खातरजमा करून घेण्यात यावी. हे ऐकल्यानंतर मात्र, माझे डोके चांगलेच फिरले आहे, याबद्दल बहुदा आमच्या हेडक्लार्कची खात्रीच पटली असणार! प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव जरी माझ्या गाठीशी असला तरीही, दैनंदिन कार्यालयीन कामात तसा मी नवखाच होतो. त्यामुळे, हे खबरदारीचे पाऊल उचलणे मला आवश्यक वाटले होते. 

“Adjutant साहेब सध्या व्यस्त आहेत पण यथावकाश तुझे काम होईल” असे काहीतरी गुरबचन सिंगला तात्पुरते सांगून हेडक्लार्कनी वेळ मारून नेली असावी. 

आमच्या युनिटकडून गेलेल्या पत्राला आठवड्याभरातच EME सेंटरमधून तारेने उत्तर आले. त्यामध्ये लिहिले होते, “चीन सीमेवरील धोला-थागला जवळील चौकीवर तैनात असताना, २१ ऑक्टोबर १९६२ रोजी, चिनी हल्ला होताच, गुरबचन सिंग हा शिपाई शत्रूसमोरून पळून गेला होता. नंतर त्याचा काहीच ठावठिकाणा न समजल्याने, त्याला ‘बेपत्ता किंवा मृत’ घोषित केले गेले होते. आता तुम्हाला तो जिवंत सापडलेला असल्याने, त्याला त्वरित ताब्यात घेऊन आम्हाला कळवावे. आम्ही आरक्षी दल पाठवून त्याला आमच्या ताब्यात घेऊ.”

सोप्या शब्दात सांगायचे तर, आर्मीच्या कायद्यानुसार तो एक पळपुटा किंवा ‘भगोडा’ शिपाई होता! आता त्याची रीतसर चौकशी होऊन त्याच्यावर यथोचित कायदेशीर कारवाई केली जाणार होती!

ती तार वाचून युनिटमधील आम्हा सर्वच अधिकाऱ्यांना धक्का बसला. आमचे CO, लेफ्ट. कर्नल सहस्रबुद्धे तर माझ्यावरच भडकले. त्यांना न विचारता, न सांगता, मी अश्या प्रकारचे पाऊल का आणि कसे उचलले याबद्दल CO साहेबांनी मला जाब विचारला. 

“सर, EME सेंटरकडे चौकशी करण्याची सणक सहजच माझ्या डोक्यात आली. तोपर्यंत तुम्ही ऑफिसमधून निघूनही गेला होतात. परंतु, तुम्ही दिलेली शिकवण माझ्या चांगली लक्षात होती की, ‘कोणत्याही कागदावर डोळे झाकून सही करू नये’.” 

माझे उत्तर CO साहेबांना नक्कीच आवडले असावे. कारण ते एकदम शांत झाले आणि त्यांनी आमच्या युनिटचे 2IC, मेजर कृष्णा आणि बॅटरी कमांडर, मेजर (पुढे निवृत्त मेजर जनरल) महंती या दोघांनाही बोलावून घेतले. आम्हा सर्वांच्या विचार-विनिमयानंतर, एकमताने असे ठरले की, आम्हाला मिळालेल्या माहितीबद्दल टेल्कोच्या अधिकाऱ्यांना, अगदी निवृत्त कर्नल ब्रार यांनाही, सध्या काहीच कळवायचे नाही. महिन्याभराने सामान घेण्यासाठी गुरबचन सिंग पुन्हा येईल त्यावेळी सापळा लावून त्याला पकडण्याचे आम्ही ठरवले.  

– क्रमशः भाग पहिला 

मूळ इंग्रजी अनुभवलेखन : ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त)

मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) 9422870294

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चंगळ… लेखिका – डाॅ. विजया वाड ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ चंगळ… लेखिका – डाॅ. विजया वाड ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

माधव आणि मधुरा घरी आल्यापासून एकदम चकित झाले होते. खरं तर न्यूझीलंडहून इन्नीअप्पांकडे हट्टानं येण्याचा निर्णय दोघांनी का घेतला होता? तर इन्नी आणि अप्पांना उतारवयात एकटं वाटू नये म्हणून! पण… इथे तर त्यांनाच एकटं पडण्याची पाळी आली होती. कशी? पाहा ना! इन्नी आणि अप्पांकडे त्या आधीच गोपाळराव आणि राधिकाबाई भिडे यांचा ठिय्या मुक्काम होता. “या राधिकाबाई भिडे. आपल्या कुटुंबसखी.” इन्नीनं ओळख करून दिली. “माझी ओळख नव्हती झाली कधी यांच्याशी.” माधव इन्नीला म्हणाला. “अरे, गेली सात वर्षे तुम्ही न्यूझीलंडला आहात. इथे आम्ही दोघं निवृत्त झाल्यावर आम्ही एक क्लब स्थापन केला. क्लबचं नावच मुळी ‘चंगळ’ क्लब. अटी तीन. एक- तुम्ही निवृत्त असायला हवेत; दोन- सुखवस्तू सांपत्तिक स्थिती असावी आणि तीन- मौज, उपभोग यात भरपूर रस असावा. तर तुला सांगते माधव, चंगळ क्लबचे नळ्याण्णव सदस्य झालेत. यात पंचेचाळीस जोड्या आहेत आणि नऊ सदस्य एकेकटे, लाईफ पार्टनर गमावलेले; पण तरीही आयुष्य आहे ते रडत जगण्यापेक्षा मजेने जगावं अशा इच्छेने आपल्यात सामील झालेले आहेत.” इन्नी म्हणाली. “मी जेव्हा इन्नींची ही जाहिरात केबल टीव्हीवर बघितली ना, तेव्हा लगेच फोन केला त्यांना. आम्ही दोघं ताबडतोब मेंबर झालो चंगळ क्लबचे. आमचा मुलगा देवर्षी अमेरिकेत आहे. कन्या सुप्रिया लग्न होऊन सध्या सिलोनला राहते. म्हणजे आपल्या आताच्या श्रीलंकेत! आम्ही दोघं अधूनमधून जातो मुलाकडे-मुलीकडे, पण करमत नाही परक्या देशात. इथेच बरं वाटतं. चंगळ क्लब सुरू झाल्यापास्नं तर इथेच उत्तम वाटतं बघ.” राधिकाबाई म्हणाल्या. माधवनं निरखून राधिकाबाई आणि आपली आई इन्नी यांच्याकडे बघितले. खरंच की, दोघी कशा तजेलदार आणि टुकटुकीत दिसत होत्या. निरामय आनंदी! समाधानी आणि संतुष्ट वाटत होत्या. “त्याचं काय आहे माधव, प्रत्येक वय हे मौजमजा एनकॅश करण्याचं असतं असं तुझ्या अप्पांचं आणि माझं स्पष्ट मत आहे. लोकलला लोंबकळून आम्ही मुलुंड ते सीएसटी तीस तीस वर्ष सर्व्हिस केली दोघांनी. पण त्यातही मजा होती. कारण दोघांनी कमावलं म्हणून तुला राजासारखं ठेवता आलं. बारावीला अपेक्षित पसेंटेज मिळाले नाही तरी प्रायव्हेटला डोनेशन देऊन शिकविता आलं. सो? नो रिग्रेट्स! पण निवृत्तीनंतर दोघांचं मस्त पेन्शन येतंय. घरदार आहेच! तू आर्थिकदृष्टीने स्वतंत्र झालायस. नो जबाबदारी! मग आता मौजच मौज का बरं करू नये? म्हणून केबलवर अँड दिली. आम्हाला ठाऊकच नव्हतं की नुसत्या मुलुंडमध्ये यवढी माणसं चंगळ’ करायला इच्छुक आहेत!” माधव आणि मधुरा यांना ते सारं ऐकून चकित व्हायला न झालं तरच नवल होतं! त्याचबरोबर इन्नी आणि अप्पांना एकटं वाटत असेल ही अपराधीपणाची टोचणीही कमी झाली होती. आपण उगाचच टेन्शनमध्ये आलो होतो हेही जाणवलं दोघांना. नंतर जेवणं फार सुखात झाली. “रोजच्या जेवणाला कुसाताई येतात स्वयंपाक करायला, पण चार माणसं येणार असली घरात की आम्ही त्यांना सांगून ठेवतो अगोदर. त्या मैनाताई म्हणून मदतनीस घेऊन येतात बरोबर. त्यांना आम्ही दिवसाचे शंभर एक्स्ट्रा देतो. खुशीनं येतात अगदी.” अप्पा सांगत होते. “आमचे मेंबर जसे वाढायला लागले तसे आम्ही ‘बिल्व’ नावाचे समविचारी लोकांचे ग्रुप तयार केले बरं का गं मधुरा. म्हणजे अगं कुणाला वाचायला आवडतं. कुणाला खादडायला आवडतं. कोणी पिक्चर, नाटक यांचं शौकीन असतं. कोणी रमीत रमतं तर कोणी मद्याचे घुटके घेत ‘एक जाम एक शाम’ करतं. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’. आम्ही काही माणसं भटकंतीवाली पण आहोत. ‘बिल्व’मध्ये समआवडींची तीनच कुटुंब एकत्र येतात. आपल्यात आम्ही, भिडे पतिपत्नी आणि शिंदे पतिपत्नी एकत्र आहेत. शिंदे सध्या बेंगलोरला मुलीच्या बाळंतपणास गेलेत दोघं. सेवेत मग्न! पण आमचे फोन चालू असतात.” इन्नीनं सांगितलं. “महिन्यातून एकदा आम्ही एकेकाकडे चार दिवस जमतो. रात्री झोपायला घरी. दिवसभर साथ साथ. आता ऑक्टोबरमध्ये आम्ही सहाही जणं कोकणात जाणारोत. डॉल्फिन शो बघायला. अगदी चंगळ आहे बघ!” अप्पा म्हणाले. “माझ्या मनात एक अभिनव कल्पना आहे.” श्रीयुत गोपाळराव भिडे म्हणाले. “हल्ली काऊन्सेलिंगचा बराच सुकाळ आहे. मॅरेजच्या आधी काऊन्सेलिंग, मरेजनंतरही प्रॉब्लेम येतात तेव्हा समुपदेशन… मुलांच्या समस्यांचं समुपदेशन, करियर कौन्सेलिंग! आता मी सुरू करतोय ‘निवृत्ती निरूपण’ यात आठ कलमी कार्यक्रम असेल. निवृत्तीआधी तीन कलम. एक – आपल्याला मिळणाऱ्या पैशांचा अंदाज घ्या. दोन- गुंतवणूक करण्यासाठी उत्कृष्ट सल्ला घ्या. तीन- आपला राहून गेलेला छंद तपासा. निवृत्तीनंतरची दोन पथ्ये- एक- घरातल्यांना न छळणे. दोन- आपल्या पार्टनरचे मन जपणे. आणि तीन गोष्टी आनंदाच्या. एक- आपल्या पैशाचा स्वतः उपभोग घ्या. दोन- समवयस्कांबरोबर ओळखी वाढवा आणि तीन- तिसरी घंटा वाजली मित्रांनो! आता मस्त चंगळ करा! चंगळ!… लाईफ इज टू शॉर्ट नाऊ!…” माधव आणि मधुरा, गोपाळराव भिडे यांच्या निवृत्ती निरूपणावर बेहद्द खूश झाले. माधव म्हणाला, “आम्हाला फार गिल्टी वाटत होतं. मी एकुलता मुलगा! इन्नी नि अप्पांना एकटं करून तिकडे दूर देशी राहतोय.” “आता काळजी करू नकोस तरुण मित्रा. चंगळ क्लब समर्थ आहे एकमेकांची काळजी घ्यायला.” भिडेकाका म्हणाले. तुम्हाला सुरू करायचा का आपल्या उपनगरात चंगळ क्लब? बघा बुवा! तिसरी घंटा वाजलीय… एन्जॉय नाऊ. ‘ऑर नेव्हर!’ म्हणायची वेळ कुणावर येऊ नये.

‘ तिसरी घंटा’ 

लेखिका – डाॅ. विजया वाड

संग्राहिका  : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सोशल मीडिया पासून सावधान… भाग – २ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ सोशल मीडिया पासून सावधान… भाग – २ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सोशल मीडिया विषयी बोलताना आपण फक्त जास्त प्रमाणात जास्त प्रमाणात वापरले जाणारे दुसरे माध्यम म्हणजे फेसबुक या विषयी बघू.

आज पहाटे मला एक रिल मुलाने पाठवले.हा एक लोकप्रिय होत असलेला नवीन प्रकार काही सेकंदात आपले म्हणणे दुसऱ्यांच्या गळी उतरवणे कधी विनोद,कधी सावध करणे हे याचे काम.तर या रिल मध्ये एक नवीन फसवणुकीचा प्रकार सांगितला आहे.आपल्याला फेसबुक वर Look who died in an accident असा मेसेज येतो.त्यात एक लिंक येते.त्यावर क्लिक केले की आपले log in चे डिटेल्स विचारतात.ते दिले की आपण out आणि विचारणारा in होतो.आणि आपल्यालाच मोठा अपघात होतो.आपले बँक खाते रिकामे होते.थोडा तपास केला असता दुर्दैवाने यात फसलेले लोक सापडले.

अजून एक उदाहरण मी बघितले.एकीने घरातील लग्न सोहळ्याचे सतत रोज होणारे कार्यक्रम फेसबुक वर टाकले.अगदी फोटो सहित.येणारे लाइक्स बघून खुश झाली.घरी बसल्या बसल्या सर्वांना सगळे कार्यक्रम फोटो,व्हिडिओ याच्या माध्यमातून दाखवू शकली.आणि या वयात मी किती जगा बरोबर आहे ( हम भी कुछ कम नही ) हे ऐटीत दाखवू शकली.मग त्यात सगळेच फोटो,विधी अगदी कव्हर केले.लग्न छान झाले.लग्नात एक आकर्षक पाकीट आले.त्यात हरखून सोडणारे गिफ्ट सगळ्या फॅमिली साठी चार दिवसाची ट्रीप मिळाली अगदी तिकिटे सुद्धा मिळाली. मंडळी खूप आनंदली.लगबगीने तयारी करून निघाली.आणि या मॅडमचे फेसबुक वर अपडेट सुरू झाले.प्रवासाचे फोटो येऊ लागले.सगळे डिटेल्स आम्हाला कळू लागले.मोठ्या आनंदात घरी आले.बघतात तर घर पूर्ण रिकामे.आंघोळीची बादली सुद्धा घरात राहिली नव्हती.हे घरातील फेसबुक वर केलेले प्रसारण किती महागात पडले?

अशा फसवणूका पण मोठ्या प्रमाणावर चालू आहेत.यात चोरांना आपणच माहिती पुरवतो.ते फक्त त्यांची थोडी हुशारी वापरतात आणि आपल्याला अद्दल घडवतात.

एक घटना तर मन बधीर करणारी समजली.एका घरात राहणारी चार माणसे.घरातील वयस्कर आजोबा वारले.मुलाने ही बातमी सगळी कडे टाकली अर्थातच सोशल मीडिया वर. सांत्वन करण्यासाठी भरभरून संदेश आले.पण प्रत्यक्ष एकही माणूस फिरकला नाही.शेवटी ८/१० तास उलटून गेल्यानंतर इमारती समोर भाजी विकणारा भाजीवाला त्याचे मित्र घेऊन मदतीला आला.

काही मंडळी तर अशी आहेत की घरात आणलेले/ केलेले किंवा आत्ता जे खायचे ते  पदार्थ देवाला नैवेद्य दाखवावा त्या प्रमाणे मोठ्या निष्ठेने फेसबुक वर पोस्ट केल्या शिवाय खात नाहीत.

मला तर हा प्रश्न पडतो आपणच आपले आयुष्य इतके सार्वजनिक ( जुन्या काळातील भाषेत सांगायचे तर चव्हाट्यावर मांडणे ) का करतो?

या काही घटना व सध्या फेसबुकवर जे सगळे बघायला मिळते ते बघून मन सुन्न होते.आणि वाटते समोरा समोर माणसांशी न बोलणारे आपण कुठे चाललो आहोत?कुठे पोहोचणार आहोत?आणि नवीन पिढीला कोणते संस्कार देणार आहोत?

हे सगळ्या घटनांनी माझ्या मनात अनेक तरंग उमटले.तरंग कसले वादळच उठले.आणि वाटले आपल्याच मंडळींना थोडे सावध करावे.नाहीतरी विष हे प्रत्येकाने थोडेच अनुभवायचे असते? त्या वरचे लेबल किंवा कोणी सांगितले तर आपण विश्वास ठेवून त्या पासून दूर जातोच की.तसेच लेबल दाखवण्याचा मी थोडा प्रयत्न केला.

माझी अगदी मनापासून विनंती आहे.ही सगळी साधने जगाची माहिती मिळवणे.परदेशातील आपल्या व्यक्तींशी संपर्क साधणे.चांगले विचार,चांगले कार्य यांचा प्रसार करणे.अशा कारणांसाठी करावा.माझी आजी कायम म्हणायची आपण आपलं जपावं आणि यश द्यावं घ्यावं हे अगदी पटते.

एक गाणे आठवते सावधान होई वेड्या सावधान होई आणि हीच सर्वांना विनंती आहे.

धन्यवाद

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘‘फिलोमेला‘…’ ☆ सुश्री निर्मोही फडके ☆

सुश्री निर्मोही फडके

(आजची कथा सुश्री निर्मोही फडके यांची आहे. त्या लेखिका, व्याख्यात्या, संपादिका आणि भाषेच्या अभ्यासक आहेत.)

? जीवनरंग ❤️

☆ ‘‘फिलोमेला‘…’ ☆ सुश्री निर्मोही फडके

पुस्तक : गुंफियेला शेला – कथा 3 : फिलोमेला – सुश्री निर्मोही फडके

जीव मुठीत घेऊन ती वेगानं धावत होती, खाचखळग्यांतून, काट्याकुट्यांतून, दगडपाण्यातून. अचानक तिला पंख फुटले आणि तिनं एका पायानं जमिनीला जोर देत दुसरा पाय दुमडून आपले हात पंखांना समांतर करत हवेत उंच भरारी घेतली.

‘ऊड फिलोमेला, ऊड, मिळालेल्या संधीचं सोनं कर,’ तिचं मन तिला आदेश देत होतं. अफाट आकाशात वारा अंगावर घेत उडताना तिला वाटत होतं, खूप जोरात ओरडून जगाला सांगावं, ‘मी फिलोमेला, राजकुमारी फिलोमेला, मी स्वतंत्र झालेय.’ 

हं, पण ओरडणार कशी? वाचा गमावली होती तिनं, त्या नराधमानं केलेल्या अत्याचारात.

फिलोमेलाच्या अलौकिक लावण्यावर, कोमल मनावर अनन्वित अत्याचार करून तिला मुकी, असहाय करून अज्ञातवासात बंदिवान करणारा तो, तिच्या सख्ख्या बहिणीचाच नवरा, राजा टेरिअस. 

‘ऊड राजकुमारी फिलोमेला, दूर जा इथून… पंख होती तो उड आती रे… मिळालेत तुला पंख,मूव्हींचं वेड असणारी निशा अगदी भान हरपून मूव्ही बघत होती. ग्रीक पुराणातली एक शापित सौंदर्यवती, तिच्या कथेवरचा मूव्ही, ‘फिलोमेला –  द नाइटिंगेल’. 

थिएटरमध्येच हा भव्य मूव्ही पाहायचा असं निशानं ठरवलंच होतं नि ती एकटीच मूव्ही पाहायला आली.

‘वाह् काय मस्त जमलाय मूव्ही, स्टोरीच दमदार. मेहुण्याकडून अत्याचार सहन करणारी फिलोमेला, हातमागावर चित्र विणून, मोठ्या शिताफीनं बहिणीला त्यातून संदेश पाठवून सुटका करून घेते. जीभ छाटल्या गेलेल्या फिलोमालाचं न गाणा-या नाइटिंगेलमध्ये झालेलं रूपांतर, वाह्, सो सिम्बाॅलिक. स्क्रीन प्ले, डायरेक्शन, अॅक्टिंग, सिनेमाटोग्राफी, ग्राफिक्…परफेक्ट, या वर्षीची दोन ऑस्कर नक्की, लिहायला पाहिजेच या मूव्हीबद्दल.’ 

निशामधला चित्रपट-आस्वादक एकेक मुद्दे मनात नोंदवण्यात गर्क असताना तिला जाणवलं, थिएटरमधल्या अंधारात आपल्या शेजारच्या सीटवरचे दोन डोळे पल्याला न्याहाळतायत नि एक हात पुढे सरकतोय.

‘फिलोमेला… फिलोमेला…’ ती मनाशी पुटपुटली.

अंगाशी सलगी करू धजावणारा तो हात तिनं कचकन पिरगळला तशी अंधारात एक अस्फुट पुरुषी आवाजातली किंकाळी उमटली नि विरली. फिल्मच्या क्लायमॅक्सच्या गोंधळात कुणालाच काही कळलं नाही.  

निशानं आपल्या आर्टिकलचं शीर्षक मनात पक्कं केलं, 
‘अजूनही लढतेय आधुनिक फिलोमेला’.

चित्रपट संपल्यावर पडद्यावर अक्षरं उमटली,

…A New Beginning.

❤ ❤ ❤ ❤ ❤

टीप – कथा वाचून आणि चित्र पाहून वाचकांना जर त्या चित्रावर आधारित नवीन कथा, कविता, लेख वगैरे सुचलं, तर त्यांनी ई-अभिव्यक्ती आणि सुश्री सोनाली लोहार यांच्याशी संपर्क साधावा.

चित्र साभार – फेसबुक पेज

©️ सुश्री निर्मोही फडके

मो. 9920146711

ईमेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अल्बम… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ अल्बम… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

दरवर्षी चार जुलैला वाढदिवस असतो माझा आणि दरवेळी मागचे किती वाढदिवस कसे झाले, ते डोळ्यासमोर येऊन जातात! जणू फोटोच्या अल्बमची पाने मी उलटत होते! पन्नास वर्षांपूर्वी फोटो काढणे हे तितकेसे कॉमन नव्हते. कॅमेराच मुळी नवीन होता तेव्हा! साधारण ६०/६५ वर्षांपूर्वी आमच्या घरी कॅमेरा होता, अर्थात ही माझ्यासाठी ऐकीव गोष्ट! माझ्या वडिलांना फोटोग्राफीची आवड होती. फोटो काढणे, ते स्वतः डेव्हलप करणे हे ते शिकले होते, त्यामुळे आमच्याकडे खूप जुने फोटो अजूनही बघायला मिळतात! स्वातंत्र्यापूर्वी वडिलांचे कुटुंब कराची ला होते, तेथील त्यांच्या घराचे, कराची शहरातील फोटो अजूनही आमच्या अल्बम मध्ये आहेत.

अगदी पूर्वीच्या कॅमेरात आठ फोटो निघत असत. नंतर छोटे छोटे सोळा आणि 24 फोटो निघणारे रोल आले. कॅमेरा मध्ये जसजशा सुधारणा होऊ लागल्या तस तसे अधिक चांगले आणि जास्त फोटो मिळू लागले.आणि खर्च ही कमी येऊ लागला. फोटोंचा अल्बम ही लोकांच्या आवडीची गोष्ट बनू लागली. घरातील लग्न,मुंजी, बारसे किंवा कोणताही कार्यक्रम असला की फोटो काढून त्यांचा अल्बम बनवला जाऊ लागला. आमचे दादा मग प्रत्येक अल्बम ला नाव देत. “गोड स्मृती” नावाचा पहिला अल्बम अजूनही माझ्या माहेरी आहे. तिथे गेले की मी कौतुकाने ते जुने फोटो बघू शकते आणि त्यामुळे मनाला खूप आनंद मिळतो. अल्बम मधील काही व्यक्ती आता काळाच्या पडद्याआड गेल्या असल्या तरी आपल्याला फोटो बघून ते जुने दिवस आणि माणसे यांचे स्मरण होते! आता तर काय मोबाईल मुळे फोटो काढणे खूपच सोपे झाले आहे, पण प्रिंटेड फोटो अल्बम ची शान मला वेगळीच वाटते!

स्वतःच्या आयुष्याचा हा अल्बम उघडताना माझ्याही डोळ्यासमोर माझ्या छोट्या छोट्या छबी दिसू लागल्या. आईच्या कडेवर बसलेली मी, तर कधी रडत असलेली, नुकतीच पावले टाकू लागलेली मी, मला फोटोतून दिसली. नवीनच पंजाबी ड्रेस घालून शाळेला जायच्या तयारीत असलेली चार-पाच वर्षाची ऋजू ही एका फोटोत दिसली. दोन वेण्या वर बांधलेल्या आणि काळ्या रंगाचे पांढरे खडी असलेले परकर पोलके घालून वडिलांबरोबर समुद्रावर फिरायला गेलेली मी, मला फोटोत दिसली. त्यानंतर स्कर्ट ब्लाउज घालून शाळेत जाणारी मी मला जाणवून देत होती की,’ तू आता मोठी झालीस!’ नकळत 1964 साल उजाडले आणि मी दहा वर्षाची झाले!

शाळेत असताना  माझ्या वाढदिवसाला आई माझ्या मैत्रिणींना घरी फराळाला बोलवत असे. आणि मग छोटासा मनोरंजनाचा कार्यक्रम ही होत असे. त्यात चिठ्ठ्या टाकून उचलायला सांगितले जाई आणि चिठ्ठीत असेल त्याप्रमाणे गाणे, नाच, नक्कल किंवा खेळ करून दाखवावे लागत असे. तेव्हा खायच्या पदार्थात पावभाजी, केक नसे पण घरी केलेले दडपे पोहे, चिवडा, लाडू यासारखे पदार्थ असत. मग आमची पार्टी मजेत होत असे. असे वाढदिवस साजरे करता करता अल्बम मध्ये मॅट्रिकच्या वर्षीचा ग्रुप फोटो आला आणि त्यामुळे आपण एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो याची जाणीव झाली.

कॉलेजची वर्षे सुरू झाली आणि घरचा वाढदिवस बंद होऊन बाहेर हॉटेलात वाढदिवस साजरा होऊ लागला. फोटोसेशन होऊ लागले. मित्र मैत्रिणींबरोबर वाढदिवस मजेत साजरे होऊ लागले. छान छान गिफ्टची देवाणघेवाण होऊ लागली आणि हा अल्बम विस्तारत गेला.

अजूनही कधी ते फोटो बघते तेव्हा पुन्हा एकदा मनावर आठवणींचे मोरपीस फिरते! बघता बघता किती वाढदिवस साजरे झाले ,परंतु खरी मजा आणि प्रेम मिळाले ते लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला! सरप्राईज म्हणून मिळणारी साडी किंवा दागिना वाढदिवसाला शोभा आणू लागला. मग नवऱ्याबरोबर केक कापतानाचा फोटो अल्बम मध्ये आला. मुलांच्या जन्मानंतर आपल्यापेक्षा मुलांचे वाढदिवस साजरे करत असलेले फोटो अल्बम मध्ये दिसू लागले. ते चौकोनी कुटुंब असे आमचे फोटो आता अल्बम खुलवू लागले!

मध्यंतरीच्या काळात मुलांनी आमचे वाढदिवस साजरे केले.’ आई, तुझ्या वाढदिवसाला मी तुला सरप्राईज गिफ्ट देणार आहे’. म्हणत मुले त्यांनी साठवलेल्या पैशातून माझ्यासाठी आठवणीने छोटी मोठी वस्तू आणू लागली आणि माझा ऊर आनंदाने आणखीनच भरून  येई! अरेच्या! किती मोठे झालो आपण! असे म्हणतच अल्बम मधल्या फोटो भर पडत होती!

आता काय साठी उलटली! मुलांची लग्न कार्ये झाली. सून, जावई, नातवंडे यांच्या आगमनाने वाढदिवस पुन्हा एकदा जोरात साजरे होऊ लागले! फॅमिली ग्रुप फोटोंची अल्बम मध्ये भर पडली. छोटी नातवंडे अंगा खांद्यावर विसाऊ लागली. काळ्या केसांमध्ये रुपेरी चांदीची भर पडली. वय जाणवायला लागले. वाढदिवसाला आणलेला गजरा माळण्याइतके ‘ केस नाही गं उरले’ असं लेकीला म्हटलं तरी,’ आई तुला मोगरीचा गजरा आवडतो ना, म्हणून मी मुद्दाम आणलाय ‘ असं म्हटलं की त्या छोट्याशा केसांवर तो घालावाच लागे. असे वाढदिवस साजरे करता करता हळूहळू साठी उलटली. सांधे कुरकुरायला लागले. आता काही नको तर वाढदिवस असे वाटू लागले. इतकी वर्षे काढलेले फोटो अल्बम मध्ये बघताना आपल्या मधला फरक जाणवू लागला!

कुठे ती लहान ऋजू, नंतर लग्नानंतरची उज्वला आणि आता तर उज्वला आजी! अल्बम मधील सरकती वर्षे बघता बघता मी रंगून गेले! फोटो मुळेच ही किमया झाली आहे. खरंच, मन:चक्षुपुढे येणाऱ्या छोट्या मोठ्या व्यक्ती आपण वर्णन करून सांगू नाही शकत! पण फोटो मुळे मात्र व्यक्ती जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी राहते ,ही तर आहे फोटो अल्बम ची किमया!

आता दरवर्षी चार जुलैला वाढदिवस येतो. मुलांच्या सोबत साजरा करताना केक कापला जातो. फोटो काढून होतात. पुन्हा एका नवीन वर्षात पदार्पण केले म्हणून! आठवणींच्या अल्बम मध्ये आणखी एका फोटोची भर! अशाच आनंदात वाढदिवस साजरा करत राहायचंय, जोपर्यंत भिंतीवरच्या फोटोमध्ये आपण जाऊन बसत नाही तोपर्यंत….

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘एक कोयता गँग – अशीही… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ एक कोयता गँग – अशीही… ☆ श्री मकरंद पिंपुटकर

बंड्या काळे त्याच्या मित्राकडे – क्राईम रिपोर्टर रजत सरदेसाईकडे आला होता. रजतच्या टेबलावर त्याने लिहिलेल्या एका लेखाचा मसूदा पडला होता – शीर्षक होतं – “आणखी एक कोयता गँग !”.

 “आता ही कुठली बाबा कोयता गँग ? पुणे परिसरातील वेगवेगळ्या कोयता गँगबद्दल तू स्वत:च तर गेले सहा महिने लिहीत आहेस की.” 

“बंडोपंत, हा लेख हातात कोयते घेऊन वार करणाऱ्या गुंडांबद्दल नाहीये. हा लेख सिकल सेल ॲनिमिया या रोगाबद्दल आहे – थॅलेसेमियाबद्दल. सिकल म्हणजे कोयता. जशी कोयता गँग धोकादायक आहे तसेच हा रोगही तसाच आणि तितकाच धोकादायक आहे हे सांगण्यासाठीचा हा प्रपंच.” रजत निरगाठ उकल तंत्राने समजावून सांगत होता.

 “ॲनिमिया ? पण तो तर रक्तातील हिमो का काहीतरी कमी झाल्याने होतो ना ?”

“हिमोग्लोबिन.”

 “हां, तेच ते.”

 “पण मग त्याचा कोयत्याशी काय संबंध ?” बंड्या पूर्णपणे out of depth होता.

 “तुला हिमोग्लोबिन म्हणजे काय ते ठाऊक आहे का ? रेड ब्लड सेल्स ?”

 बंड्याचा चेहरा कोराच आहे हे पाहून रजतने समजावण्यास सुरुवात केली. — “रक्तात रेड ब्लड सेल्स असतात. यांचा नॉर्मल आकार मेदुवड्यासारखा असतो. त्यात हिमोग्लोबिन प्रोटीन असतात. ही प्रोटीन्स फुफ्फुसांमधून आलेला ऑक्सिजन शरीरात सर्वत्र पोचवतात आणि तयार झालेला कार्बन डाय ऑक्साईड गोळा करून फुफ्फुसांपर्यंत पोचवतात.”

बंड्याला फारसा काही अर्थबोध झालेला दिसत नव्हते. 

“थोडक्यात सांगायचं तर हिमोग्लोबिनशिवाय ना प्रत्येक अवयवाला ऑक्सिजन मिळेल, ना प्रत्येक अवयवातून कार्बन डाय ऑक्साईड गोळा केला जाईल.”

 “पण मग यात कोयता कुठे आला ?” बंड्याचा हैराण प्रश्न.

“काही अनुवांशिक बदलांमुळे या मेदुवड्यासारख्या असणाऱ्या रेड ब्लड सेल्स कोयत्यासारख्या (sickle) किंवा चंद्रकोरीसारख्या (crescent moon) होतात. त्यांचे ऑक्सिजन व कार्बन डाय ऑक्साईड वहनाचे काम ते करू शकत नाहीत, शिवाय टोकेरी आकारामुळे रक्तवाहिन्यांना इजा होते ती वेगळीच. ऑक्सिजन न मिळाल्याने अशा पेशंटसना धाप लागते, गुदमरल्यासारखं होतं, सतत अशक्तपणा राहू शकतो.”

 “अरे बाप रे, असं लफडं आहे होय ?” लेखाची पानं चाळता चाळता बंडू म्हणाला. “पण हा रोग होतो कशाने ? चौरस आहार न घेतल्याने, अस्वच्छतेमुळे का संसर्गाने ?”  

 “नाही. यापैकी कशानेच हा रोग होत नाही. हा रोग आई वडिलांतील अनुवंशीय (genetic) बदलांमुळे होतो. ज्यांना थॅलेसेमिया झाला आहे अथवा जे थॅलेसेमियाचे वाहक (carrier) आहेत अशा आईवडिलांच्या मुलांना थॅलेसेमिया होण्याची शक्यता खूप जास्त असते. सिंधी, लोहाणा आणि पंजाबी समाजांमध्ये थॅलेसेमियाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे लग्नापूर्वी कुंडली, पत्रिका जुळवून बघण्यापेक्षा आपण थॅलेसेमियाच्या दृष्टीने कोणत्या गटात – थॅलेसेमिया मुक्त, वाहक का रोगी – कोणत्या गटात मोडतो ते तपासून बघण्याचा आग्रह धरला गेला पाहिजे. आपण थॅलेसेमियाचे रोगी वा वाहक असलो तर दुसऱ्या थॅलेसेमिया रोगी वा वाहकाशी लग्नच करू नये अथवा केलेच तर मुलं होण्याचा चान्स न घेतलेलाच बरा.  डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग हे गोंड समाजामध्ये कार्यरत आहेत. या समाजात ‘एक देव’, ‘दोन देव’ अशा उपजाती आहेत आणि वर वधू दोघंही एकाच उपजातीचे असलेले त्यांना चालत नाही. या समाजातही थॅलेसेमियाचे प्रमाण जास्त आहे. म्हणून मग डॉ. बंग यांनी त्यांच्या धार्मिक भावनांचा आधार घेत त्यांना सांगितलं, की आता समाजात आणखी एक नवी उप-जात आली आहे – सिकल देव. ही उप-जात रक्त तपासणीतून ओळखता येते, आणि नवरा बायको दोघेही ‘सिकल देव’ उप-जातीचे असले तर तेही चालत नाही.”

 “व्वा ! त्या बिचाऱ्यांना हे वाहक, रोगी प्रकरण कळणार नाही. पण त्यांच्या धार्मिक श्रद्धांना जोडल्याने हे काम सोप्पं होऊन गेलं,” बंड्याला हे पटलं…..  “पण मग या रोगावर उपाय काय ? हा रोग कशाने बरा होतो ?” 

 “आजच्या घडीला तरी हा रोग पूर्णपणे बरा कधीच होत नाही. Prevention is better than cure हे इथं अगदी चपखलपणे लागू पडतं. बाळ आईच्या गर्भात असताना नाळ किंवा गर्भजलाची तपासणी करून बाळाला थॅलेसेमिया आहे का नाही हे सुनिश्चित करता येते. दुर्दैवाने जर बाळाला थॅलेसेमिया झालाच तर या रोगाच्या तीव्रतेनुसार विविध उपाययोजना करता येतात. चौरस आहार व व्हिटॅमिन यांनी पेशंटची प्रकृती चांगली रहाण्यास मदत होते. नियमितपणे हात धुणे, संसर्ग टाळणे यानेही पेशंटची आजारी पडण्याची वारंवारिता frequency कमी करता येते. अनेकदा गरजेनुसार महिन्यातून एकदा पेशंटला चांगले रक्त देणे – blood transfusion – हा उपाय प्रामुख्याने केला जातो. पूर्वी रक्तदात्याच्या आरोग्याबद्दल ठोस माहिती नसायची. व दात्याकडून मिळालेल्या रक्तामुळे कावीळ, HIV असे रोग पेशंटला होण्याची भीती असायची. पण आता मिळणाऱ्या रक्ताची सखोल परीक्षा होते, व हे रक्त निर्धोक आहे याची खात्री पटल्यानंतरच ते पेशंटला दिले जाते, त्यामुळे हा धोका आता मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. तसेच, रक्त स्वीकारतानाच्या सुया व अन्य वैद्यकीय अवजारे आता one time use असतात किंवा व्यवस्थित निर्जंतुक केली असतात, त्यामुळे त्यातून अन्य संसर्गाचे वा रोगाचे संक्रमण होण्याची शक्यता आता खूप कमी झाली आहे. (करोना काळात मात्र या पेशंटना रक्त मिळवण्यास खूप अडचणी आल्या.)

 सारखे रक्त स्वीकारल्याने पेशंटच्या रक्तातील लोहाचे प्रमाण धोकादायकरीत्या वाढू शकते. त्यामुळे हे प्रमाण कमी करणारी औषधे पेशंटला घ्यावी लागतात. सुदृढ बाळाच्या नाळेतील पेशी वापरणे (stem cell therapy), bone marrow transplant असेही उपचार केले जातात. आयुर्वेद, होमिओपथी यांच्याही काही औषध पद्धती आहेत, परंतु आजच्या घडीला तरी, या जनुकीय आजारावर (genetic disease) १००% खात्रीलायक, १००% परिणामकारक उपाय नाही. 

 पाच दहा वर्षांपूर्वी, या रोगाची प्राणघातकता खूप भयावह होती. आजच्या घडीला हा इतका जीवघेणा रोग नाही, परंतु पेशंटला जपावे खूप लागते. जसं कोयता गँग बाबतीत वेळीच आणि नियमित सावधगिरी घेणं गरजेचं आहे, तसंच या रोगाचं आहे, आणि म्हणूनच या अशा सिकल सेल ॲनेमियाच्या कोयता गँगपासून सावध राहिलं पाहिजे,” रजतने सांगितले आणि तो समेवर आला. 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ घडी मोडणे… ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ घडी मोडणे… ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले 

पूर्वी नवी साडी घेतली की बायका कोणाला तरी घडी मोडायला द्यायच्या…. 

किती प्रेमळ रिवाज होता ना तो.. आतासारखी वारंवार साड्यांची खरेदी नसायची तेव्हा..वर्षाला एखाद – दोन साड्यांपर्यंतच मध्यमवर्गीयांची पण  मजल असायची…. त्याच त्याच साड्या नेसाव्या लागत..पण तरीही आपली नवी कोरी साडी, नणंदेला, जावेला, शेजारणीला घडी मोडायला द्यायला, मन मोठंच असावं लागत असेल.. 

नात्यागोत्यातली एखादी गरीब बाई पण घडी मोडायला चालायची… त्यानिमित्ताने तिच्या अंगाला कोरं कापड लागायचं…. तिला कानकोंडं वाटू नाही म्हणून, ” तुम्ही नेसल्या की मला पटपट नव्या साड्या मिळतात “.. असंही वरून म्हणायचं..आणि गरिबीनं पिचलेल्या त्या माऊलीला तिचा पायगुण चांगला असल्याचा आनंद बहाल करायचा…..

  …… आर्थिक श्रीमंती असो-नसो, पण मनांच्या श्रीमंतीचा तो काळ होता हे मात्र नक्कीच खरं …… 

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सोशल मीडिया पासून सावधान… भाग – १ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ सोशल मीडिया पासून सावधान… भाग – १ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आज फक्त Whatsapp विषयी बघू या.पुढील काही वाक्ये बघू.विशेषत: महिलांनी लक्षात घ्यावे.

▪️ डी पी छान आहे.

▪️ Good morning

▪️ काय चालले आहे

▪️ आज काय केले?

▪️ फारच सुंदर डिश

▪️ मग फुलांच्या इमेज

▪️ एकाच ग्रुप वर असेल तर कोणतीही पोस्ट लाईक करणे.

▪️ किती अप्रतिम लिहिता.

▪️ फोन वर बोलू या

हे असे हळूहळू वाढत जाते.किंवा कधीकधी एकतर्फी गैरसमज पण करून घेतले जातात.जसे पोस्ट लाईक केली म्हणजे मी आवडले/आवडलो.संभाषण कसे वाढते हे खूप बघितले आहे. त्यातून उगाच दिवा स्वप्ने पाहिली जातात.जे घडलेच नाही पण मनात असते ते सांगितले जाते.किंवा काही कामा निमित्त फोन झाला तरी अमुक व्यक्ती मला सगळे सांगते.असे समज करून घेणे.या सगळ्यात एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे जे कौतुक घरातून मिळत नाही ते मिळू लागले की माणूस त्यात वाहवत जातो.हे सगळे फक्त पुरुष करतात असे नाही.सध्या हे प्रमाण ५०/५०% झाले आहे.बरेच जण या आभासी जगाला खरे मानतात.आणि मानसिक संतुलन गमावतात.

पण हे सगळे चालू असताना डोळे, कान,बुध्दी सगळे उघडे ठेवावे.साधे विचार या आभासी जगाचे वास्तव दाखवतात.साध्या ओळखीवर फुले,good morning येऊ लागले तर हा विचार करावा या व्यक्तीने हे कितीतरी जणींना/जणांना पाठवलेले असू शकते.किंवा असे संभाषण किती व्यक्तींशी चालू असेल.सुरुवातीलाच हा विचार करून बंदी घातली तर पुढचे सगळे टाळता येते.ज्या व्यक्ती फक्त Dp मध्ये बघतो त्यावर विश्वास कसा ठेवायचा?तो फोटो कोणाचाही असू शकतो.किंवा १० वेळा एडिट करून सुंदर बनवलेला असू शकतो.काही दिवसा पूर्वी एक तक्रार आली होती.शोध थोडा तपास लावला तर वेगळेच सत्य समोर आले.त्या महिलेचे अकाऊंट व फोन तिचा नवरा वापरून पुरुषांना नको ते मेसेज करत होता.आणि पुरुष त्यात वाहवत होते.असे संभाषण करून त्याने अनेक लोकांकडून पैसे घेतले होते.असे बरेच वेगवेगळे किस्से माझ्याकडे आहेत.

म्हणून सर्वांना विनंती आहे,या कडे फक्त एक करमणुकीचे साधन म्हणून बघावे.चांगले असेल ते घ्यावे.आणि कोणत्याही भ्रमात राहू नये.येथील ओळखी लाटांप्रमाणे येतात.आणि ओसरतात.मी ९५० नंबर ब्लॉक केले आहेत.

त्या पेक्षा वाचन,व्यायाम,पदार्थ बनवणे,जवळचे मित्र,मैत्रिणी यांच्यात जाणे.कुटुंबात गप्पा मारणे.गाणी ऐकणे,फिरणे,सहलीला जाणे हे करावे. व या आभासी जगा पासून सांभाळून रहावे.

माझ्या कडे समुपदेशनासाठी ज्या व्यक्ती येतात त्यांच्या अनुभवातून हे लिखाण केले आहे.

क्रमशः...

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मन वढायं वढायं… ☆ सौ उज्ज्वला केळकर ☆

सौ उज्ज्वला केळकर

??

☆ मन वढायं वढायं… ☆ सौ उज्ज्वला केळकर

आयुष्याची ८ दशके सरली. सरली म्हणजे, कशी-बशी गेली नाहीत. छान मजेत गेली. आताशी मी त्याला म्हणते, ‘ये. लवकर ये. मी तयार आहे, गाठोडं बांधून.’ मग माझं मलाच हसू येतं. तो तर माझी कायाही घेऊन जाणार नाहीये. गाठोडं कुठलं न्यायला? तो माझ्यात कुठे तरी असलेलं प्राणतत्त्व घेऊन जाणार. हे सगळं माहीत असतं, तरी मी माझी गाठोडी कवटाळून बसते. दोन गाठोडी आहेत माझी…..  

… पहिले एक गाठोडे आहे… ज्यात सुखद स्मृतींची तलम, मुलायम, नजरबंदी करणारी, बेशकीमती महावस्त्रे आहेत. त्यांच्या आठवणींनी मनावर मोरपीस फिरल्यासारखं वाटतं, पण कसं आणि का, ते कळत नाही, हे गाठोडं क्वचितच कधी तरी उघडलं जातं. दुसऱ्या गाठोडयाच्या तुलनेने हे गाठोडं आहे अगदीच लहान, चिमुकलंच म्हणता येईल, असं.  

… दुसरं आहे, ते आहे एक भलं मोठं गाठोडं….  पर्वताएवढं.. नव्हे त्यावर दशांगुळे उरलेलं….. 

अनेक विवंचना, चिंता, काळज्या, समस्यांच्या चिंध्या, लक्तरे, चिरगुटे…  जगताना घेतलेल्या कटु स्मृतींचे हे गाठोडे. माझ्या बाबतीत कोण, कधी, काय चुकीचे वागले, कुणी माझा जाणीवपूर्वक अपमान केला, कुणी, केव्हा दुर्लक्ष केले, मला तुच्छ लेखले,  या सगळ्या दु:खद आठवणी, .. आणि कुणी कधी दिलेल्या दु:खाचं, केलेल्या अपमानाचं, दुखावलेल्या अस्मितेचं, चिंता काळज्यांचं, ताण- तणावांचं, विवंचनांची चिरगुटं असलेलं …… हे असं सगळं… नकोसं – क्लेशकारक वाटणारं..तरीही मनात घट्ट चिकटून राहिलेलं सगळंसगळं या गाठोड्यातून ओसंडून वहात आहे.  हा कचरा बाहेर टाकून देण्यासाठी मी हे गाठोडं पुष्कळदा उघडते. . कचरा बाहेर काढते. पण बहिणाबाईंनी म्हटले आहे त्याप्रमाणे, 

‘मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर — 

किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर’

किती प्रयत्न केला, हा कचरा काढून फेकून द्यायचा…  केशवसुत म्हणाले आहेत  त्याप्रमाणे जाळून किंवा पुरून टाकण्याचा…. पण नाहीच.. हा कचरा जणू अमरत्व लाभल्यासारखा आहे. पुन्हा पुन्हा येऊन गाठोड्यात बसतो. बुमरॅँग जसं ते फेकणार्‍याकडेच परत येतं, अगदी तसंच आहे हे.

हे मोठं गाठोडं, कटू स्मृतींचं….. सतत उघडलं जातं. विस्कटलं जातं. तो सारा कचरा, चिंध्या, चिरगुटं गाठोड्यातून बाहेर काढून फेकून द्यायचं ठरवते. फेकून देतेही. पण त्या पुन्हा लोचटासारख्या गाठोड्यालाच येऊन चिकटतात.

आता साधीशीच गोष्ट. मी एम. ए., एम. एड. पर्यन्त शिकले. 30 वर्षे अध्यापनाची नोकरी केली. निवृत्त होऊनही 20 – 22 वर्षे झाली. नशिबाने आणखी काय द्यायला हवं? पण सारखं मनात येत रहातं , मी पी. डी. सायन्स झाल्यावर आर्टसला का आले? आले तर आले, इकॉनॉमिक्स, मॅथ्स यासारखे चलनी विषय का घेतले नाहीत? ग्रॅज्युएट झाले. नोकरी मिळाली . मग लोकसेवा आयोगाच्या परीक्षा का दिल्या नाहीत? अधिक चांगल्या संधी मिळाल्या असत्या. आता या काळात आणि या वयात या विचारांना काही अर्थ आहे का? त्यांचा काही उपयोग आहे का? पण तो विचार उगीचच येत रहातो आणि मन खंतावत रहातं. ही झाली एक गोष्ट. अशा किती तरी जुन्या गोष्टी अकारणच मनात साठून राहिल्या आहेत आणि पुन्हा पुन्हा उफाळून येत दु:खी करताहेत.

कधी कधी मैत्रिणी जमलो, की सहजच घरातल्या गोष्टी निघतात. ‘ सासू तेव्हा असं म्हणाली, नणंद तसं बोलली. कितीही करा आमच्या विहीणबाईंचा पापड वाकडाच. मुलांसाठी किती केलं, पण त्यांना कुठे त्याची पर्वा आहे.’ असंच काही- बाही बोलणं होतं. मी त्यांना म्हणते, “ नका ना या जुन्या आठवणी काढू ! अशा दु:खद आठवणी काढायच्या म्हणजे तेच जुनं दु:ख आपण पुन्हा नव्याने जगायचं. कशाला ते….”   

अर्थात दुसर्‍याला सांगणं सोपं असतं. स्वत:च्या बाबतीत मात्र ‘ लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण ‘ अशीच माझी स्थिती. मीही जुन्या जुन्या दु:खद आठवणी पुन्हा पुन्हा  मनात घोळवत रहातेच.

परवा परवा ‘उमेद’ ग्रुपवर एक पोस्ट वाचली. 1 जून … एक टास्क.. आपल्या मनातील दु:खे, वाईट विचार, चिंता, काळज्या, लिहून काढा आणि त्यातून बाहेर पडा. आपली पाटी स्वच्छ ठेवा. मी म्हंटलं, बरी संधी आहे, आपण मोकळं व्हायला. मनाची पाटी कोरी करायला. मी सगळं लिहून काढलं. नंतर पाटी पुसू लागले. पण ती काही पुसली गेली नाही. त्यावरचं सारं लेखन शीलालेखासारखं अमीट झालं.

सध्या रहाते, तो माझा बंगला छान आहे. 37-38 वर्षे आम्ही या घरात रहातोय. इथले शेजारी-पाजारी चांगले आहेत. कामवाल्या घरच्यांसारख्याच आहेत. गरज पडली तर मदतीला कोणीही येईल, अशी परिस्थिती आहे. छान बस्तान बसलं आहे आमचं सध्याच्या घरी. पण सात-आठ महिन्यात बसेरा बदलायचा आहे. हे घर सोडून नव्या घरी फ्लॅटवर रहायला जाण्याची शक्यता आहे. आम्हा म्हातारा-म्हातारीला जमेल का सगळं? जुनाट वृक्ष नव्या वातावरणात रुजवायचे आहेत. रुजतील? तिथली फ्लॅट संस्कृती पचनी पडेल आमच्या? शेजारी कसे असतील? काही होऊ लागलं, तर कुणाची मदत मिळेल? मुलगा आणि सून आपआपल्या कामातून किती वेळ काढू शकतील? प्रश्न… प्रश्न… आणि फक्त प्रश्न ….खरं तर पुढच्या श्वासाची शाश्वती नाही, असं मी मनाला सतत बजावत असते आणि त्याचवेळी भवितव्याचा अनावश्यक विचार करत व्यथित होते. आपलंच टेन्शन वाढवते. ‘ देवा आजचा दिवस सुखाचा दाखवलास, उद्याची भिस्त तुझ्यावरच रे बाबा !’ असं म्हणण्याइतकी आध्यात्मिक उंचीही मनाने गाठलेली नाही.

अनेक गोष्टी अशा असतात, ज्या बाबतीत मी प्रत्यक्ष काहीच करायचं नसतं. तरीही काही गोष्टी, काही विचार भाकड गायीप्रमाणे मनात हुंदडत असतात आणि मन तणावग्रस्त करतात. आता हेच बघा,     ‘ मुलाला प्रमोशन कधी मिळेल? सुनेला नोकरी मिळेल ना? नातीला मेडीकलला अ‍ॅडमिशन मिळेल ना? नातवाची टी.व्ही. ची क्रेझ जरा कमी होऊन तो थोडा मनापासून अभ्यास करायला लागेल का?’ …. यापैकी कशावरही माझं नियंत्रण नाही. पण तरीही याबाद्दलचे विचार काही मनातून हद्दपार होत नाहीत. आताशी एक विचार मनात घोळू लागलाय. अर्चनाताईची समुपदेशनासाठी अपॉईंटमेंट घावी. बघूया, त्याचा तरी काही उपयोग होतोय का?

अगदी अलीकडे अनघा जोगळेकर यांची .हॅँग टिल डेथ या इंग्रजी नावाची हिन्दी लघुकथा वाचली होती, ती अशावेळी हमखास आठवते. ती कथा मराठीत अशी आहे —

“  हॅँग टिल डेथ 

‘ मीनू, मी बघतोय, जेव्हा जेव्हा तुला वैताग येतो, किंवा तू काळजीत, चिंतेत असतेस, तेव्हा तेव्हा तू खोलीत जाऊन कपाट उघडतेस. तिथेच थोडा वेळ उभी रहातेस. मग थोड्याच वेळात तुझा चेहरा हसरा होतो. अखेर त्या कपाटात असं आहे तरी काय?’

पलाशचं बोलणं ऐकून मीनू हसली.

‘छे छे, केवळ हसून काम भागणार नाही. आज तुला हे रहस्य उलगडून दाखवावंच लागेल. ‘ पलाशच्या आवाजात थोडा आवेश होता. मग नजर चुकवत म्हणाला, ‘तुझ्या अपरोक्ष मी ते कपाट अनेक वेळा उघडून पाहिलं. शोधाशोध केली पण….. अखेर असं आहे तरी काय तिथे?’ तो जवळ जवळ ओरडतच म्हणाला.

मीनू थोडा वेळ त्याच्याकडे बघत राहिली. मग तिने त्याचा हात धरला आणि त्याला खोलीत घेऊन आली. तिने कपाट उघडले.

‘ ते बघ माझ्या खुशीचं रहस्य!’

‘अं… तो तर एक हँगर आहे. …. रिकामा हँगर…’ 

‘ होय पलाश. तो हँगर आहे, पण रिकामा नाही. याच्यावर मी माझ्या सार्‍या चिंता, काळज्या, त्रास, वैताग लटकवून ठेवते आणि कपाट बंद करण्यापूर्वी  त्यांना म्हणते,— ‘ मरेपर्यंत लटकत रहा ! ’ मी माझ्या काळज्या, त्रास, वैताग माझ्या डोक्यावर स्वार होऊ देत नाही. त्या माझ्यापासून दूर केल्यानंतरच त्या निपटून काढते. ‘

… आणि आता त्या कपाटात एकाऐवजी दोन हँगर लटकलेले आहेत….. 

मी सध्या त्या कथेतील मिनूच्या शोधात आहे. एकदा भेटली की विचारणार आहे, “ बाई ग, तू त्या सार्‍या सार्‍या चिंता, काळज्या, त्रास, वैताग रिकाम्या हँगरवर कशा लटकावून ठेवतेस? एकदा प्रात्यक्षिक दाखव ना ! प्लीज…..” 

©️ सौ उज्ज्वला केळकर

संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print