मराठी साहित्य – विविधा ☆ मी एक असमंजस… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

मी एक असमंजस ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

या पूर्वी माझा डोळसपणा व माझा कानसेन पणा आपण वाचला आहे. आज तर मला माझ्या समजुती की गैरसमजुती ? शहाणपणा की मूर्खपणा ? यातच गोंधळ होऊ लागला आहे. आणि मी सामान्य नसावी असे वाटू लागले आहे. हे असे वाटण्याची कारणे पण सांगते. मलाच माझ्यावर शंका येऊ लागली आहे.

तर काही दिवसांतील अनुभव सांगते. मी अनेक वर्षे सकाळी लवकर चालायला जात असते म्हणजे आपले मॉर्निंग वॉक. तर यात विशेष काय? सगळेच जातात ना ? असे मला वाटते. पण चालायला आल्यावर छान निसर्ग ( असेल तर ) बघावा. गवतावर चालावे, फुलांचा,गवताचा,झाडांचा मंद सुगंध भरून घ्यावा. स्वतःशी मस्त संवाद करावा. काही काळ फोन,इतर साधने यांना विश्रांती द्यावी. अशी माझी समजूत आहे. म्हणून मी फोन शक्यतो घरी ठेवते. पण यात रमणारी मी मूर्ख ठरते. कारण बघावे त्यांच्या कानात निरनिराळी बटणे ( आपले हेडफोन्स ) दिसतात. एकदा तर चांगलीच गंमत झाली. माझ्या शेजारून चालणारी मुलगी अचानक माझ्याशी बोलू लागली. मला तेच हवे असते. मी कुठेतरी वाचले होते, दोन माणसे एकमेकांशी बोलत आहेत हे सर्वात सुंदर दृश्य आहे. मी तर माणूस वेडी. ती बोलत आहे हे बघितल्यावर मी पण बोलू लागले. आणि थोड्याच वेळात ती माझ्याकडे विचित्र नजरेने बघू लागली. कारण ती त्या बटण सदृश्य हेडफोन मधून अनेक कि.मी. जवळ असलेल्या व्यक्तीशी बोलत होती. आणि मी तिच्याशी. मग माझ्या विषयी तिचे गैरसमज होणारच. अजून एक गंमत अनुभवास येते. बरीच मंडळी जाता येता झाडाची पाने तोडतात व काही अंतरावर टाकून देतात. हे बघून मला मात्र वाईट वाटते. असे वाटते त्या झाडांनी तुमचे काय बिघडवले आहे? तसे सांगण्याचा प्रयत्न केला तर लोक विचित्र नजरेने बघतात. काही मंडळी तर गवतावर बसतात. आणि हाताने त्याच जागेवरचे गवत उपटतात. बरेचदा आपण हे करत आहोत हे पण त्यांच्या लक्षात येत नाही. मी लक्षात आणून दिले की तेच विचीत्रपणे बघणे अनुभवते.

माझा अजून एक मूर्खपणा सांगते. त्याच मॉर्निंग वॉक वरून परतत असताना मला एक वेगळाच छंद जडला आहे. ज्यांचे नळ चालू आहेत व पाणी वाया जात आहे ते बंद करायचे. ज्यांच्या पाण्याच्या टाक्या ओसंडून वहात आहेत त्यांना त्यांच्या घरात जाऊन सांगायचे व वाहणारे पाणी बंद करायला लावायचे. आणि रस्त्यावर वाहणाऱ्या नद्या बंद करायच्या म्हणजेच रस्ते स्वच्छ करणे थांबवायचे. आहे ना वेडेपणा? कारण आम्ही बिल भरतो, आमचा नळ आहे तुम्हाला काय करायचे आहे? अशी मुक्ताफळे ऐकून घ्यावी लागतात. तरी मी काही सुधारत नाही. याच पाण्या बाबत आमचा वेडेपणा सांगते. तर आम्ही काय करतो ते सांगते म्हणजे तुम्हाला पण पटेल. आम्ही  डाळ,तांदूळ,भाज्या धुतलेले पाणी एका छोट्या बादलीत घेतो आणि ते कुंड्यातील झाडांना घालतो. कपडे धुतलेले पाणी सडा टाकायला वापरतो. कपडे पिळलेले पाणी संडास,बाथरुम धुवायला वापरतो.पाणी प्यायला देताना शक्यतो अर्धा ग्लास देतो. लागले तर पुन्हा देता येते. आणि तरीही उरलेच तर एका भांड्यात साठवतो. ते कुठेही वापरता येते. गाड्या नळीने न धुता अशा साठवलेल्या पाण्यातून धुणे/पुसणे करतो. पण पक्ष्यांना मात्र एका मोठ्या भांड्यात आवर्जून पाणी ठेवतो.

आहे ना वेडेपणा?

हीच गोष्ट लाईटची घराबाहेरील लाईट रात्र रात्र चालू असतात. बरे हे काम करायला रस्त्यावरील सरकारी दिवे चालू असतात. काहींच्या घरात संडास, बाथरुम यातील लाईट चोवीस तास चालू असतात. आपल्याला खटकले आणि विनंती करून सांगितले तरी उत्तर तेच मिळते. आम्ही बिल भरतो. आमच्या घरात किंवा बाहेर लाईट ठेवतो. तुम्हाला काय करायचे आहे? आम्ही मात्र प्रत्येकाच्या हाताला व मनाला सवय लावून घेतली आहे, ज्या खोलीतील काम होईल त्या खोलीतील लाईट बंद करायचे. आहे ना वेडेपणा?

एक असाच वेडेपणा नुकताच अनुभवला. मतदान करण्यासाठी सुट्टी मिळाली होती. शनिवार रविवार याला जोडून सुट्टी होती. म्हणजे उत्तम योग. आणि त्याचा फायदा उच्च विद्या विभूषित हुशार लोकांनी घेतला. मस्त जोडून रजा घेऊन छान थंड हवेची ठिकाणे गाठली की. आणि आमच्या वयाची काही मूर्ख माणसे ७/८ तास प्रवास करुन मतदानासाठी पोहोचली. आणि आमच्या सारखे कर्मचारी तर ऊन,तहान सगळे विसरून,स्वतःला होणारे त्रास विसरुन मतदान अधिकारी म्हणून काम करत होते. आहे ना मूर्खपणा?

असे बरेच वेडेपण आहे. जाता जाता अजून एक वेडेपणा सांगते. हल्ली मस्त रात्री केक कापून मोठ्या आवाजात गोंधळ करुन  Happy Birthday साजरा करतात. केक तोंडाला फासतात. आम्ही मात्र वाढदिवस सकाळी साजरा करतो. सुवासिक अंघोळ घालतो. गोडाचे जेवण करतो. औक्षण करतो. देवळात जाऊन आशीर्वाद घेतो. एखाद्या संस्थेत त्या दिवशी जेवणाचा होणारा खर्च देतो. आहे ना वेडेपणा?

इतरांचे उच्च आवाजातील संगीत, डीजेचे व अपरात्री फटाक्यांचे आवाज ऐकणारे आम्ही. स्वतःच्या घरात कुलर लावताना त्याचा आवाज इतरांना त्रास देईल का? हा विचार करून आपला फॅन लावून झोपणारे आम्ही. आहोत ना वेडे?

तर मंडळी असे वेडेपणाचे बरेच किस्से आहेत. नमुना म्हणून काही सांगितले. आणि आपल्याच मंडळींचा सल्ला घ्यावे वाटले. म्हणून हा लेखन प्रपंच केला आहे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “पप्पू पास झाला…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“पप्पू पास झाला…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

…” अगं रखमे का गं असं कसनुसं त्वांड घेऊन बसलीयास!… कसला एव्हढा पेच पडलाय तुला? … परवाच्या दहावीच्या परिक्षेत तुझा पप्पू पास झाला न्हवं!… आखरीला त्येचं घोडं गंगेत न्हायलं कि!… तू त्यो पास व्हावा म्हनुनशान दर वरसाला कसलं कसलं उपास तपास करत व्हतीस.. हायं ठावं मला!…पप्पू आता लै मोठा झाला… मिळलं कि तालुक्याला त्येला एखादी नोकरी बिकरी!… मगं धाडलं कि पगाराचं पैसं तुला!… सुटका व्हईल बघ तुझी या काबाडकष्टातनं!… खाशील चार घास बघशील सुखाचं चार दिस… अगं आता हातातोंडाशी आलेला घास असताना तू हसत खेळत राहायचं सोडून बैजार का गं?… माझंच बघ कि  समंध तुला ठावं हाय न्हवं… दोन पोरं पोटाला असून बघ कशी बेवारसा परमानं जगणं जिती… जाईल तिकडं त्येंना मुलूख थोडा हायच म्हनायचा..आनि  मागचा दोर त्येंनी कापून कवाच टाकला… सोताचा संसार घरदार केल्लं नि मला म्हातारीला ,आपल्या घरला, गावाला इसरून गेलं… देवाची किरपा म्हनून डुईला छप्पार न  भाताची पेज करून खायला चार दाणं भातं पिकवणारी  जमिन हायं म्हनून तरले बघ… चार कायबाय बोला चालायला तुझ्यासारखी मैतरनी हायती तवा रोजचा दिस सरतो एकल्याला.. न्हाई तर काय बी खरं न्हवतं… परं रखमे तुझं तर लै बेस हाय कि… तरी बी काळजीनं काळी ठिक्कर पडलीयास कि… काय झालं, घडलं ते तर सांगशिल का न्हाई?”…

.”.. काय बोलायचं गोदाक्का!… संसाराचा खेळखंडोबाच लिवलाय माझ्या नशिबात!… त्यो ह्या जल्मात संपतोय का न्हाई कुनास ठावं.?.. सावकाराकडं चाकरीला धनी व्हतं पाच सा वरसा मागं त्येंना त्या सावकाराच्या खुनाच्या भानगडीत जे पकडून नेलया ते तिकडं जेलात… अजून कोर्ट कचेरीत खरा खोट्याचा निवाडा होतोय जनू.. किती दिसं, महिनं का वरिस जातील याला मोजदाद कुठवर करायची?… वकिलाला पैका द्यायला धडुत्यात तो असायला हवा कि!… शेतावर भांगलयाला जातं व्हते त्यावर पोराचं नि माझं प्वाटं तरी भरत व्हतं!… सरपंच देव मानूस बघं त्येनं पोराची शाळंची काळजी घेतली… तवा कुठं दहावी पतुर प्वारं शिकलं बघं.. न्हाई म्हनायला चार पाच येळेला गटांगळ्या खाल्या त्यानं बी.. पन तड गाठली… तुला हे काय म्या नव्यानं सांगायला हवं.!.. तुझ्या समोरच सगळं घडत बिघडतं गेललं दिसतं व्हतंच कि!… त्ये येळेला तू माझी जिवाभावाची भनीवानी आधार देत व्हतीस कि!…पन तुला यातली आतली गोम काय व्हती ती ठावं नसंल.?.. अगं शाळंपायी माझा पप्पू त्या सरपंचांच्या घराकडंच दिसरात गुरावानी दावणीला बांधल्यावानी तिकडचं कि गं!… मीच त्येला जाता येता हाळी मारून बोलयाची… पप्पू बोलायचा ,’आये तू माझी काय बी काळजी करू नगंस.. मी हथं बेस हाय बघ… सरपंच मला म्ह़नातात दहावी झाल्यावर तालूक्याला बाजार समिती वर नोकरीला लावतो म्हनून.. तवर इथली चार पडत्त्याल ती कामं करत जा… ‘चांगलं दिसं येनार ह्या आशेवर पप्पू नि मी राहिलो बघं… पन ते चार दिस आमच्या पतूर कधीच आलं  न्हाईत… अन पप्पू मातर ते दिस येतील या खुळ्या आशेवर बसला नि राबराबत राहिला… संतरंज्या घालन्या काढन्यापासून, घरातली संबंध काम उरकन्यापर्यंत, विलेक्शन च्या मोर्चात, सभंत, लोकांना पैसं, धोतार, लुगडी वाटन्या पतूर.. पोस्टार लावणं म्हनू नको, ते घरघरात जाऊन सरपंचालाच मत द्या असा परचारचं म्हनू नको….. लोकांना मतदानादिवशी घेऊन आणयाला… आनि कशा कशाला पप्पू धावत व्हताचं… त्येला बी आपलं सरपंच निवडून यावं असं लै वाटतं हुतं… अगदी इमानदारीनं खपत हुता…त्या टायमाला  एक दिस बी घराकडं त्यो आला न्हाई कि कवा माझ्या नदरंला पडाया न्हाई… सरपंचा च्या घरला इचारलं तर ‘त्ये बेनं असलं इकडं तिकडं बोंबलत गावातनं.. ‘असं काहीबाही वंगाळ सांगायचे… मला लै भ्या वाटायचं.. पप्पू ची लै काळजी वाटत हूती.. एक दोन बाऱ्या त्येच्या दोस्तांच्या कडं त्येची इचारपूस बी केली.. पन त्येंनी बी’ काय कि पप्पू ला दोन दिसा माघारापासून बघितालाच न्हाई  असं जरा दबकतच बोलले… तोच कोन तरी मधीच त्वांड उघडलाच.. सरकारी हॉस्पिटलात पडलाय तो… कवाधरनं.’.. माझ्या पायाबुडीची वाळूच सरकली नव्हं… म्या तडक हॉस्पिटल गाठलं.. त्येच्या वारड बाहीर पोलीस उभा व्हता… मला त्यांनी आत सोडायची परमिशन न्हाई म्हनून अडवून धरलं.. म्या रडत भेकतं त्या पोलीसाचं पाय धरलं म्हनलं एक डाव नदरनं त्येला माझ्या लेकराला कसा हाय ते बघू द्या.. मगं मी हथनं हालन.. डोळ्याचं पानी खळंना आणि हृदयाचं पानी पानी झालेलं… काय झालं ?कशानं झालं ?कुणा मुळं ?कशा कशाचा पत्तया लागंना… सरपंचाची माणसं सारखी येत जात व्हती… त्या फौजदारी संगट हसत खिदळत बोलत असताना मला कळालं… सरपंच निवडणुकीत हरला व्हता… त्येचा राग धरून सरपंचाची पोरं जितलेल्ल्या  पुढाऱ्यांच्या माणसांना  लाठ्या काठ्या, सुरे तलवारी घेऊन मारायला धावले.. त्यांच्या बरोबर पप्पू पण व्हता.. बरीच हाणामारी, डोकी फुटली, हातपाय तोडले…पप्पूच्या डोक्याला जबराट लागलं… कुणीतरी उचलून त्येला हास्पिटलात टाकला.. सरपंच येऊन फौजदाराला सांगून गेला…’ हि दंगा करणारी माझी माणसं न्हाईत.. कुणीतरी भाडेकरू गुंड आणलेले दिसतात… तुम्ही यांना खुशाल जेलात टाका.. पन माझं नावं मातर कुठचं आणायचं न्हाई… आनि यांच्या घराकडं पन कळवू नका… उगाच माझ्या डोसक्याला न्हाई तो ताप व्हईल… तेपरीस इथचं पडनात का.’.. . एव्हढं त्या पोलीसांनी सांगितलं.. म्या पप्पूला आत जाऊन बघितलं तर त्येच्या डोक्याला प्लॅसटर.. हातपाय बांधलेलै.. नाकाला नळकाडं… बघितलं.. तिथली ती सिस्टर म्हनाली लै सिरियस केस हाय… कधी काय व्हईल काय नेम न्हाई… तवा… म्या तशीच बाहीर येऊन शान डोकं धरून बसून राहिलं… देवाला नवस करत… कोन येनार हायं माझ्या मदतीला अश्या वकताला… दिसरात ततचं काढले… पन अजून काई फरक दिसना..फौजदार मला महनले पोलीस केस झालीया… पप्पूला गुन्हेगार शाबूत केलयं.. जिता राहयला तर जेलात ठिवनार अन त्या आदुगर गेलाच तर केस बंद करून टाकनार…गोदाक्का माझ्या पप्पूनं  आपुनच ती केसच आताच  बंद करून टाकली… घराकडं निघाले तर वाटत तू भेटलीस…गोदाक्का माझा पप्पू इतकं दिसं नापास होत व्हता आनि नेमका यावेळेला तो पास झाला तवा…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्मरणांजली… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सुश्री उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ स्मरणांजली… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

कै. सुहास विनायक सहस्त्रबुद्धे, माझे पती, एक डॉक्टर म्हणून सेवाव्रती, अतिशय मृदू स्वभावाचे, 11 एप्रिल 2024 रोजी त्यांचे निधन झाले आणि माझ्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली!

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात आणि पृथ्वीवर ती जोडी अवतरते, तसे आम्ही दोघे संसारात बांधले गेलो. आमची दोन्ही घरे मध्यम परिस्थितीतील, शिक्षणाला महत्त्व देणारी, त्यामुळे माझ्या एम्.ए.पर्यतच्या शिक्षणानंतर स्वाभाविकच लग्नाचा विषय निघाला आणि डॉक्टर सुहास सहस्त्रबुद्धे ( एम बी बी एस्) हे स्थळ आल्यानंतर लवकरच आमचे लग्न झाले!

ह्यांच्याविषयी सांगायचे तर त्यांना मेडिकलला जाण्याची प्रथमपासूनच इच्छा होती. त्यामुळे चिकाटीने अभ्यास करून त्यांनी मिरज मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळवली. त्याचवेळी त्यांची इतर भावंडेही इंजीनियरिंगला, कॉमर्सला, अशी शिकत होती. माझ्या सासऱ्यांची सरकारी नोकरी होती. एकट्याच्या उत्पन्नात एवढ्या मुलांची शिक्षणे करणे खरोखरच अवघड होते. तरीही कै. मामा आणि कै.आई यांनी मुलांसाठी खूप कष्ट घेऊन शिक्षण पूर्ण केली..

M.B.B.S. झाल्यानंतर पुढे शिकण्याची इच्छा असूनही घरच्या परिस्थितीचा विचार करता यांनी सर्व्हिस करायचे ठरवले आणि मेडिकल ऑफिसर म्हणून पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर ते रुजू झाले. तो काळ आणीबाणीचा होता. त्यामुळे सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करताना खूपच त्रास सहन करावा लागत होता. नवीन नोकरी असल्यामुळे रजा, सुट्टी मिळत नसे, पण चिकाटीने ह्यांचे काम चालू होते.  आणीबाणीतील आठ दिवसांच्या रजेत 20 फेब्रुवारी 1976 रोजी आमचे लग्न पार पडले!

पुढे तीन महिन्यानंतर म्हणजे मे महिन्यात आमचे  पाटण येथे बिऱ्हाड झाले.  संसाराची खरी सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने ह्यांची ओळख झाली.

ते नेहमी दवाखान्यात व्यस्त असत..तरी त्यातूनही सब सेंटर असलेल्या चाफळ, कोयना नगर या ठिकाणी दवाखान्याची व्हिजिट असली किंवा सातारला महिन्याची मीटिंग असली की जीपने आम्ही जात असू आणि तेवढीच ट्रीप करून येत असू. यथावकाश या संसारात मी ही रमले!

19 ऑक्टोबर 1977 रोजी  केदारचा जन्म झाला. आम्ही दोघेही त्याच्या बाललीलात रमून गेलो. ह्यांना लहान मुलांची खूप आवड, त्यामुळे केदार खूप लाडका !

पुढे शिरपूरला बदली झाली.नोव्हेंबर 1979 च्या दरम्यान कन्या- प्राचीचा जन्म झाला आणि आमच्या चौकोनाचे चारी कोन पूर्ण झाले!

1981 मध्ये सांगली सिव्हिल हॉस्पिटलला ह्यांची मेडिकल ऑफिसर म्हणून बदली झाली. तेथे गव्हर्नमेंट कॉलनीत असलेल्या प्लॉटवर आम्ही घर बांधले व दवाखानाही सुरू केला. त्याच प्लॉटवर माझे धाकटे दीर – प्रकाश सहस्रबुद्धे यांचेही घर, दुकान होते. दोन्ही घरातील संबंध खूप छान होते. आता आमची दोन मुले, दिरांच्या दोन मुली, सासुबाई आणि आम्ही चौघे असे गोकुळासारखे नांदते घर झाले!

सिव्हिल हॉस्पिटल ला मेडिकल ऑफिसर म्हणून यांनी रक्तपेढीमध्ये असताना  खूप काम केले. रक्तदान शिबिरे आयोजित करणे, नियमितपणे  कॅंप घेऊन रक्त गोळा करणे , चाकोरी बाहेर जाऊन ही काही रुग्णोपयोगी कामे करणे हे  चालू असे. सिव्हिल हॉस्पिटल मध्येच ब्लड बँकेवर मेडिकल ऑफिसर, CMO, RMO अशा वेगवेगळ्या पोस्टवर काम केले.हे काम करत असताना योग्य वेळी योग्य ते निर्णय घेणे त्यांना जमत असे.सर्वांशी मिळून मिसळून तसेच आपल्या पदाचा मान राखून ते काम करत असत.शांत स्वभावामुळे लोकांना त्यांचा आधार वाटत असे.याच काळात ओगलेवाडी, कवठेमहांकाळ,नांद्रे याठिकाणी मेडिकल ऑफिसर म्हणून  त्यांनी चांगले काम केले.

सतत तीन वर्षे त्यांना शासनाचा उत्कृष्ट सेवेबद्दल पुरस्कार मिळाला. हे सर्व करत असतानाच त्यांचे सोशल वर्क ही चालू होते. एड्स जागृतीच्या काळात अनेक संस्थांमध्ये व्याख्याने, शिबिरे वारंवार घेत असतच. कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी तेथे काम करत असलेल्या श्री. अडसूळ सर यांच्याबरोबर एक प्रोजेक्ट केला. शंभर मुलींची निवड करून त्यांना वर्षभर योग्य आहार, टॉनिकच्या गोळ्या तसेच दर महिन्याला वैद्यकीय तपासणी अशा तऱ्हेने मदत करून त्यांच्या हिमोग्लोबिन मध्ये वाढ करता येते हे या प्रकल्पाने दाखवून दिले. तसेच एकल पालक असलेल्या, लांबून येणाऱ्या मुली निवडून त्यांना येणारा बसखर्च देणे व कॉलेजमध्ये येण्याविषयी प्रवृत्त करणे यासाठी दहा मुलींवर दरमहा लागणारा खर्च  स्वतः करून साधारणपणे पाच हजार रुपयांची मदत त्याकाळी त्यांनी केली.

नोकरीची बत्तीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर  नातवंडांसाठी पुणे आणि दुबई असे वास्तव्य केले. लहान मुलांची आवड त्यामुळे  त्यांनी अत्यन्त आनंदाने  जमेल तेवढी मुलांना मदत केली. आमचे स्नेही, बापट सर तर त्यांना कौतुकाने “बालमित्र” म्हणत!कोणत्याही लहान मुलाला रमवण्याची कला त्यांना अवगत होती.. “आता उरलो उपकारापुरता” म्हणत म्हणत  2015 पासून ह्यांनी ” स्वामी समर्थ डायग्नोस्टिक सेंटर” ला अगदी कमी मानधन घेऊन रोज तीन चार तास काम सुरू ठेवले होते.

कोरोनाच्या काळात तेथील काम बंद झाले होते. तसेच नकळत ह्यांना वयाची चाहूल जाणवू लागली होती..

गेल्या एक-दीड वर्षात घरातील काही दुःखद घटनांमुळे त्यांचे मन अधिकच हळवे झाले होते. त्या गोष्टीचा ह्यांच्या मनावर नकळत खोल आघात झाला..

तब्येत थोडीशी खालावली. तरीही ते आपला आहार, व्यायाम याबाबत खूप जागरूक होते.स्वत: मितभाषी होते पण सहवासात गप्पिष्ट माणसे लागत.त्यांना नातेवाईक आणि मित्रमंडळी त गप्पा ऐकायला आवडत असे.आणि एखादंच मार्मिक वाक्य बोलून ते वातावरण हलके फुलके ठेवत.

माझ्या साठी त्यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी केल्या.. एक म्हणजे मला प्रवासाची आवड म्हणून यूरोप ट्रीप ला पाठवले! दुसरं त्याहून महत्त्वाचे म्हणजे माझ्या लेखनाला प्रोत्साहन देऊन माझी दोन पुस्तके प्रकाशित केली! दुसऱ्या साठी करणे हा त्यांच्या मनाचा केवढा मोठेपणा होता.

प्रथमपासूनच त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी अतिशय साध्या होत्या. शिळी भाकरी, दाण्याची चटणी आणि साईचं दही हा आवडता नाश्ता होता. जेवणामध्ये आमटीचे प्रेम फार होते. गोड पदार्थ जवळपास सगळेच आवडत असत पण “शिरा” हा त्यात अत्यंत आवडीचा! देवाची पूजा करणे हे आवडीचे काम होते. मन लावून देवपूजा करत असत, म्हणूनच की काय परमेश्वराने त्यांना जास्त त्रास होऊ न देता आपल्याकडे नेले. आमच्या घरात गोंदवलेकर महाराजांची भक्ती, सेवा केली जात असे. “श्रीराम” हा तारक मंत्र नेहमीच जपला जाई.

माझ्या संसारातील प्रत्येक आठवणीचा क्षण हा त्यांच्याशी गुंफलेला होता. आता क्षणोक्षणी ही आठवणींची माला माझ्या डोळ्यासमोर उभी राहते आणि जन्मोजन्मी आमची साथ अशीच राहू दे, ही परमेश्वर चरणी प्रार्थना करते !

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ AMOR FATI – आमोर फाटी : नशिबावरचा विश्वास – संकलन : प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ AMOR FATI – आमोर फाटी : नशिबावरचा विश्वास – संकलन : प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

हा शब्द लॅटिन भाषेतला आहे. याचा उच्चार कसा करतात मला माहित नाही. मी आमोर फाटी असा करतोय… याचा अर्थ आहे नशिबावरचा विश्वास“.

आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट मग ती वाईट असली, नुकसान करणारी असली तरीही ती तशी घडणे आवश्यक होते… अशा दृष्टिकोनातून ती गोष्ट स्विकारणे. ती गोष्ट आवडली नाही तरीही ती स्विकारणे… अगदी झेन तत्वज्ञानात सांगितलेल्या शांततेने, प्रसन्नतेने स्विकारणे. 

थाॅमस एडिसन जेवत होता. तेवढ्यात एक माणूस धावत आला.  त्याने वाईट बातमी आणली होती. एडिसनच्या प्रयोगशाळेला आग लागली होती. 

एडिसनने त्याला कसा प्रतिसाद दिला असेल असे वाटते?

“अरे देवा, काय हे… माझं नशिबच फुटकं… माझी सगळी मेहनत वाया गेली… ” ..  अशी?

की त्याने खूप चिडून, बिथरून, आरडाओरड केली असेल?

… पण यापैकी काहीच घडलं नाही. एडिसनने आपल्या मुलाला हाक मारली आणि म्हणाला, “अरे तुझ्या आईला आधी बोलाव, तिला अशी आग परत पहायला मिळणार नाही.”

स्वाभाविकपणे मुलाला हेच वाटले की आपल्या बापाचे डोके फिरले, वेडा झाला बाबा. आजवर केलेली सर्व मेहनत आगीत भस्मसात होत होती आणि एडिसन शांत होता. तो शांतपणे म्हणाला, “आग लागली हे बरं  झालं. माझ्या सगळ्या चुका आणि इतर अनावश्यक गोष्टी जळून गेल्या.”

आमोर फाटी खऱ्या स्वरुपात स्विकारणे म्हणजे काय, याचे हे उदाहरण म्हणता येईल – नशिबात असलेली गोष्ट आनंदाने स्विकारणे. ६७ वर्षांचा एडिसन विमनस्क, हताश, उदास काहीच न होता नव्या उत्साहाने कामाला लागला. आगीत भस्मसात झालेली संपत्ती त्याने दसपटीने परत मिळवली.

मी या आमोर फाटी कल्पनेच्या प्रेमातच पडलोय. का माहितेय? कारण आपलं नशिब स्विकारण्यातली ताकत मला समजलीय. यात अक्षरशः एवढी प्रचंड ताकत आहे की आपल्याला काहीच अशक्य वाटत नाही.  प्रत्येक गोष्ट होण्यामागे काही कारण असतं आणि ती गोष्ट सकारात्मकतेने स्विकारणे हे तुमच्या हातात असते.

# कदाचित तुमचा जाॅब गेला असेल,

# कदाचित तुमची आयुष्यभराची कमाई कोणी लुबाडली असेल,

# कदाचित तुमच्या सर्वात प्रिय व्यक्तीला असाध्य रोग झाला असेल,

# कदाचित तुम्हाला कोणी अत्यंत वाईट वागणुक दिली असेल,

# कदाचित आयुष्याने तुमच्यासमोर असे आव्हान उभे केले असेल ज्यातून तुमची सुटका नाही,

तुम्ही हे सगळं हसत स्विकारता आणि त्यातूनच नव्या उर्जेने पुढे जाता – – “ याला आमोर फाटी म्हणतात.” 

संकलन : प्रा. माधव सावळे

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – “युवर मेडिकल रिपोर्ट इज नॉट फेवरेबल. यू आर मेडिकली अनफिट..” रिसेप्शनिस्टचे शब्द ऐकून मला धक्काच बसला.

“यू मे कॉल ऑन अवर मेडिकल ऑफिसर डाॅ.आनंद लिमये.ही इज अ राईट पर्सन टू टेल यू द करेक्ट रिझन.” ती म्हणाली.

मी नाईलाजाने जड पावलांनी पाठ फिरवली. ‘कां?’ आणि ‘कसं?’ या मनातल्या प्रश्नांना त्याक्षणी तरी उत्तर नव्हतं. आता डॉ.आनंद लिमये हाच एकमेव आशेचा किरण होता! मला अचानक बाबांनी दिलेल्या दत्ताच्या फोटोची आठवण झाली.एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा मी माझ्या शर्टचा  खिसा चाचपला.पण..पण तो फोटो मी नेहमीसारखा आठवणीने खिशात ठेवलेलाच नव्हता.सकाळी निघतानाच्या गडबडीत माझ्या नकळत मी तो फोटो घरीच विसरलो होतो.तीच रुखरुख मनात घेऊन मी डॉ. आनंद लिमये यांच्या क्लिनिक समोर येऊन उभा राहिलो..)

माझं तिथं येणं त्यांना कदाचित अपेक्षित नसावं.मला पहाताच ते काहीसे अस्वस्थ झाल्याचा भास मला झाला.मी तिथे येण्यामागची सगळी पार्श्वभूमी त्यांना थोडक्यात सांगितली. अतिशय पोटतिडकीने त्यांना माझी सगळी कर्मकहाणी सांगून स्टेट बँकेतली ही नोकरी या परिस्थितीत माझ्या जगण्याचा एकमेव आधार आहे हे त्यांना पटवून द्यायचा माझ्यापरीने प्रयत्न करीत राहिलो. ते काहीसे चलबिचल झाल्याचे जाणवले.

“पण तुमच्या ब्लड, यूरिन, स्टूल सगळ्याच रिपोर्ट्समधे निगेटिव्ह ईंडिकेशन्स आहेत. अशा परिस्थितीत मी फेवरेबल मेडिकल रिपोर्ट कसा देणार? आणि आता तर मी ऑलरेडी माझा रिपोर्ट ब्रॅंचला सबमिट केलेला आहे.अशा परिस्थितीत…”

“पण डॉक्टर, मुंबईला आयुष्यात मी प्रथमच आलोय. त्यामुळे हवापाण्यातल्या बदलामुळे मला नुकताच ताप येऊन गेला होता.मेडिकल टेस्टच्या एकदोन दिवस आधीच ताप उतरला होता. रिपोर्ट्समधल्या त्या त्रुटी हा त्याच्याच परिमाण असणार ना?माझी औषधं अजून सुरु आहेत आणि या त्रुटी औषधाने यथावकाश दूर होणाऱ्याच तर आहेत.मग केवळ त्यामुळे बँकेत नोकरी करण्यासाठी मी कायमस्वरूपी अनफिट कसं काय ठरु शकतो?” 

“हो, पण तुम्ही तुमच्या आजारपणाबद्दल मला आधी कल्पना द्यायला हवी होतीत ना? मेडिकल टेस्ट कांही दिवस पुढे ढकलता आली असती. अॅट धीस स्टेज… आय ॲम हेल्पलेस. सॉरी.. आय कान्ट डू एनिथिंग…”

खूप आशेने मी इथे आलो होतो. निराश होऊन बाहेर पडलो. खूप एकटं.. खूप निराधार वाटू लागलं.अंधारुन आलेल्या मनात प्रकाशाची तिरीप यावी तशी ‘त्या’ची आठवण झाली आणि… ‘त्या’नेच मला सावरलं! हो.. ‘त्या’नेच..! कारण त्याची आठवण झाली त्याच क्षणी ‘सगळं सुरळीत होईल काळजी नको’ हे बाबांचे शब्दही आठवले. मनात ध्वनित झालेल्या त्या शब्दांनी ‘तो’च मला दिलासा देतो आहे असा भास झाला आणि मी सावरलो!आता स्वस्थ बसून चालणार नाही, अखेरपर्यंत शक्य असतील ते सगळे प्रयत्न आपणच करायला हवेत याची जाणिव झाली. लहानपणापासून वेळोवेळी कानावर पडलेले बाबांचे शब्द मला आठवले आणि मी सावरलो….!मनात उमटत राहिलेले त्याच शब्दांचे प्रतिध्वनी मला दिलासा देत माझ्या विचारांना योग्य दिशा  देत राहिले…

‘त्याच्याकडे कधीच कांही मागायचे नाही. जे घडेल ते मनापासून स्वीकारायचे. खंबीरपणाने त्याला सामोरे जायचे. आपल्या हिताचे काय आहे ते आपल्यापेक्षा तोच जाणतो. आणि योग्य वेळ येताच आपल्याला तो ते न मागता देतोही. आपण कर्तव्यात कसूर करायची नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा सोडायची नाही. तो यश देतोच. क्वचित कधी अपयश आलंच, तर ते दीर्घकाळाचा विचार करता आपल्या हिताचंच होतं हे नंतर जाणवतंच…’ मनात घुमणारा बाबांचा शब्द न् शब्द मला त्या हताश मनोवस्थेत योग्य मार्ग दाखवून गेला. मनावरचं दडपण थोडं कमी झालं.

‘काहीही अडचण आली तरी बँकेच्या नंबरवर मला लगेच फोन कर’ हे निरोप घेतानाचे भावाचे शब्द मला आठवले.मनात उलटसुलट विचारांनी पुन्हा गर्दी केली…..

‘त्याला फोन करायलाच हवा. हे सगळं त्याला सांगायलाच हवं… पण.. पण कसं सांगायचं? काय वाटेल त्याला हे सगळं ऐकून? त्याने आणि घरी आई-बाबांनीही आपण आज स्टेट बँकेत जॉईन झालोय हेच गृहीत धरलंय.आता हे सगळं ऐकून काय वाटेल त्यांना..?”

मी मनावर दगड ठेवून  जवळच्याच पोस्टात गेलो. भावाला फोन लावला खरा पण रिसीव्हर धरलेला माझा हात भावनातिरेकानं थरथरु लागला. मोजक्या शब्दात सगळं

सांगतांनाही आवाज भरून येत होता. सांगून संपलं तरी क्षणकाळ त्याच्याकडून काही प्रतिसादच आला नाही. त्याला सावरण्यासाठी तेवढा वेळ तरी आवश्यक होताच.

“हे बघ, तू स्वतःला सावर. डिस्टर्ब होऊ नको. अजूनही यातून काही मार्ग निघेल” तो म्हणाला.

“नाही निघणार…”मी रडवेला होऊन गेलो..”कसा निघणार..?”

“आपण प्रयत्न तरी करु.मी माझ्या मॅनेजरसाहेबांशी बोलतो. स्टाफ डिपार्टमेंटमधे त्यांच्या चांगल्या ओळखी आहेत. ते नक्की मदत करतील. काळजी करू नकोस.मी आधी माझ्या साहेबांशी बोलून बघतो.तू थोड्या वेळाने मला फोन कर. आपण बोलू सविस्तर”

मी रिसिव्हर खाली ठेवला. त्याक्षणी मन स्वस्थ झालं. काहीतरी मार्ग निघण्याची थोडीशी कां असेना पण आशा निर्माण झाली होती.

हा आशानिराशेचा खेळ पुढे अनेक महिने असाच सुरु राहिला. अथक प्रयत्न, संपर्क,गाठीभेटी, रदबदल्या सगळं झाल्यानंतर अखेर या सगळ्या प्रकरणाला अनपेक्षित पूर्णविराम! हाती कांही न लागताच अखेर सगळं हातून निसटून गेलंच. स्टेट बँकेची पूर्वीची वेटिंग लिस्ट रद्दसुद्धा झाली आणि नवीन भरतीसाठी पेपरमधे पानभर जाहिरातही झळकली..!

केवळ भावाच्या आग्रहाखातर त्या जाहिरातीस प्रतिसाद म्हणून मी स्टेट-बँकेत पुन्हा नव्याने अर्ज केला. याच दरम्यान पूर्वी मेहुण्यांच्या ओळखीतून खाजगी नोकरीसाठी त्यांनी शब्द टाकला होता त्याची परिणती म्हणून शिवडीच्या ‘स्वान-मिल’मधल्या पीएफ् डिपार्टमेंटला मला दिवसभर चरकातून पिळून काढणारी तुटपुंज्या पगाराची नोकरी मिळाली. नव्या खेळाला नव्याने सुरुवात झाली..!

पुढे जे काही घडत गेलं ते सगळं योगायोग वाटावेत असंच होतं. पण तरीही जणू काही कुणीतरी ते मुद्दाम घडवत होतं. ‘कुणीतरी’ म्हणजे माझ्या मनात मी श्रद्धेनं जपलेला ‘तो’च होता! कारण वरवर योगायोग वाटणाऱ्या पुढे घडत गेलेल्या सगळ्याच घटना अघटीत वाटाव्यात अशाच होत्या हे माझं मलाच जाणवत होतं. आणि आत्तापर्यंत घडलेल्या या सगळ्या नकारात्मक  बारीकसारीक घटना म्हणजे ‘त्या’नेच केलेले या सगळ्या अनिश्चिततेतून मला अलगद बाहेर काढण्यासाठीचे पूर्वनियोजन होते याचा प्रत्ययही आला. पण तोपर्यंतचा संघर्षाचा काळ मात्र माझी आणि माझ्या ‘त्या’च्यावरील श्रद्धेची कसोटी पहाणाराच होता!

‘क्वचित कधी अपयश आलंच तरी ते आपल्या हितासाठीच होतं हे कालांतरानं जाणवतंच’ हे कधीकाळी ऐकलेले बाबांचे शब्द मी त्या संघर्षकाळात घट्ट धरून ठेवले होते आणि पुढे ते आश्चर्यकारकरित्या शब्दशः खरेही ठरले!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “गुरू आसपासचे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “गुरू आसपासचे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मला मंडईत जायला फार आवडते. हिरव्यागार ताज्या भाज्यांचे ढीग बघताना मनाला प्रसन्न वाटते. 

भाजी विकणारे ओळखीचे झाले आहेत. त्यांच्याशी संवाद साधण्याचा आनंदही असतो. बरं हा नुसता आनंद नाही तर त्यांच्याकडून शिकायला पण  मिळते.

 

एक काका फक्त पालेभाज्या विकतात. त्या दिवशी गेले तर काका खुर्चीवर बसले होते. शेजारी एक टेबल मांडले होते आणि त्यावर पालेभाज्या निवडून प्लास्टिकच्या पिशवीत भरून पॅक करून ठेवल्या होत्या .मला सांगायला लागले

 

“मुलांनी  हे सुरू केले आहे .पुढची पिढी आहे ..नवीन काही करायचं म्हणते करू दे. आता आपण जरा मागे राहूया असं ठरवलं आहे बघा..”

 

मुलगा उत्साहात सांगायला लागला “काकू तुम्हाला काही हवं असेल तर मला व्हाट्सअप करा. घरपोच निवडलेली भाजी आम्ही पुरवतो. माझे तीन मित्र मिळून आम्ही हे चालू केलेले आहे.”

 भाजीचं काम मुलाच्या हाती सोपवलं तरी त्याला मदत करत काका बसले होते. त्यांच्या या निर्णयाच मला अप्रूप  वाटलं. त्यांनी मला एक छान धडा दिला.

 

ऊन ,वारा ,पाऊस  झेलत ..एक आजी गेले कित्येक वर्ष विड्याची पानं विकत आहेत.  हळूहळू म्हाताऱ्या होत जाताना मी त्यांना पाहते आहे .मांडी घालून त्या बसलेल्या असतात. टोपलीत पानं सुंदर पद्धतीने मांडून ठेवलेली असतात .देताना हळुवारपणे  हाताळतात. सैलसर बांधून देतात. मुक्तपणे खळखळून नेहमी हसत असतात.

कस जमत आजींना हे…..अस नेहमी माझ्या मनात येत.

 

एक कानडी भाजीवाले आहेत. त्यांना दोन मुली आहेत .आपल्या मुलीच पुढे धंदा चालवणार आहेत हे त्यांनी ओळखले आहे.

त्यांच्या सावळ्या, तरतरीत ,हसतमुख अशा दोन मुली त्यांना मदत करतात. बारा वाजता त्यांची शाळा असते .पण सकाळी दोन तास त्या वडिलांच्या हाताखाली काम करतात. आनंदाने शांतपणे त्या भाजी वजन करून देत असतात .

मला त्या मुलींचे फार कौतुक वाटते. आत्तापासूनच त्या शिकत आहेत पुढे त्या निश्चितच यशस्वी होतील.

 

एक बाई स्वतःच्या शेतातली  भाजी घेऊन बसलेल्या असतात. बाकीच्या भाज्यांची पोती  नवरा होलसेल मध्ये विकतो. तोपर्यंत त्या भाजी विकतात.

भाजी विकून झाली की तिथेच मिळणार शेव, फरसाण ,गाठी ,चुरमुरे, फळं घेऊन ठेवतात.

” पोरा बाळांना आवडतं ना म्हणून घेऊन जायचं .

मला सांगत होत्या.

 

सगळ्यात शेवटी फुलं घ्यायला सरू कडे जाते .ती गेल्या गेल्या”या काकु”म्हणते.

तिथे एक माणूस चहा विकतो. अगदी दोन-तीन घोट मावतील असा त्याचा छोटासा कप आहे. तो चहा ती आग्रहानी पाजते. आज फुलं दिल्यानंतर तिने टपोरा गुलाब त्यात घातला .

“हा तुमच्या बाप्पाला …आणि त्याला सांगा सरूच्या नवऱ्याला जरा अक्कल दे..”

“हो ग केव्हाच सांगितलं आहे”

मग काय म्हणाला तुमचा बाप्पा……..

तो म्हणाला 

सरू   शहाणी ,समंजस सोशीक आहे. संसारासाठी कष्ट करतीय. असं म्हणून तुझं कौतुक करत होता.”

 

” नेहमीसारखं गोड गोड बोलून लावा मला वाटेला “….

असं हसत  ती म्हणाली. मी पण हसून घेतलं …

बाप्पाच्या हातात काही नाही हे तिला पण माहित आहे आणि मला पण…..

 

या सगळ्याजणी पहाटे उठतात.  मार्केट यार्डला जातात. तिथे फुलं,भाज्या घेतात .टेम्पोत बसून इथे येतात. रस्त्यावर बसून विकतात. किती कष्ट करतात. हा विचार केला की मी त्यांच्याकडून शिकते.

मग उगीच छोट्या छोट्या गोष्टींच्या तक्रारी करत नाही .

 

मनात खूप संमिश्र भावनांची मंडई भरलेली असते ….

आजकाल ती फार  जाणवायला लागलेली आहे…

जीवन आनंदाने कसं जगावं हे शिकवणारे  माझे हे गुरु …

आसपास वावरत आहेत….

शिकत राहते त्यांच्याकडून…

श्री दत्तात्रेयांनी चोवीस गुरू केले मग आपण कोण?

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हाफ पोलिस – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

हाफ-पोलीस…… नितीन महादेव यादव

? इंद्रधनुष्य ?

☆ हाफ पोलिस – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

हाफ-पोलीस… — गुन्हेगारांचं परफेक्ट स्केच काढणारा आपला माणूस….!

आज आपण पोलीस खात्यातील एका अशा कर्तबगार माणसाला भेटणार आहोत जो पोलीस नसूनही गुन्हेगारांच्या मुसक्या आवळतो.

CID मालिकेत तुम्ही अनेकदा स्केच आर्टिस्टला पाहिलं असेल पण आज भेटूया एका खऱ्याखुऱ्या स्केच आर्टिस्टला.

हाफ-पोलीस…… नितीन महादेव यादव

हे गेल्या ३० वर्षांपासून पोलिसांसाठी गुन्हेगारांचे स्केच काढून देण्याचं काम करत आहेत. त्यांनी आजवर काढलेल्या स्केचेसमधून तब्बल ४५० स्केचेसच्या आधारे गुन्हेगारांना यशस्वीपणे पकडण्यात आलं आहे. आज जाणून घेऊया पोलीस खात्याचा अविभाज्य भाग असलेल्या नितीन महादेव यादव यांच्याबद्दल.

कुर्ल्याच्या साबळे चाळीत राहणारे नितीन यादव हे त्यांच्या मित्रपरिवारात हाफ-पोलीस म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कामाची लिस्ट जर बघितली तर त्यांची कर्तबगारी पोलिसांपेक्षा कमी नाही. गेल्या २५ वर्षांपासून ते एक रुपयाही न घेता पोलिसांसाठी गुन्हेगारांची चित्रे काढत आहेत. या कामात त्यांचा हातांना विलक्षण देणगी लाभली आहे.

नितीन यादव यांचा प्रवासाला सुरुवात झाली ती त्यांच्या लहानपणी. कामगारांच्या ज्या संपाने मुंबईचा चेहरामोहरा बदलला त्याचा मोठा फटका हा नितीन यादव यांच्या कुटुंबालाही बसला होता. ७ वी इयत्तेत असतानाच त्यांना शाळा सोडावी लागली होती. पोटापाण्यासाठी ते नंबर प्लेट्स, बॅनर, इत्यादी रंगवण्याचं काम करायचे.

एकेदिवशी पोलीस स्टेशनमध्ये ते चौकीचा बोर्ड आणि नावाच्या पाट्या रंगवत होते. त्याचवेळी पोलीस स्टेशन मध्ये एक केस आली. GSK हॉटेल मध्ये हत्या झाली होती. हॉटेलच्या वेटरनेच फक्त चहा देताना गुन्हेगाराचा चेहरा पाहिला होता. नितीन यादव पोलिसांकडे गेले आणि त्यांनी म्हटलं, ‘’जर तुम्ही वेटरला बोलतं केलंत तर मी त्याच्या वर्णनावरून खुन्याचं चित्र काढू शकतो.’’ पोलिसांनी मंजुरी दिली. नितीन यादव यांच्या स्केचच्या आधारे गुन्हेगार केवळ ४८ तासात पकडला गेला. त्यावेळी ते १० वीत शिकत होते.

लहान वयात त्यांच्या हातांनीच त्यांचा पुढचा मार्ग शोधला होता. या कर्तबगारीनंतर त्यांचा प्रवास सुरु झाला. आजवर अनेक महत्वाच्या गुन्ह्यांच्या तपास कामात त्यांनी मदत केली आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर २०१३ चं शक्तीमील बलात्कार प्रकरण, पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट अशा महत्वाच्या केसेसमध्ये त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे.

त्यांचा कामातील हातखंडा दाखवणारा एक किस्सा पाहा. ज्यावेळी अजमल कसाबवर खटला चालू होता तेव्हा फोटोग्राफर्सना कोर्टात येण्यास बंदी होती. एका पत्रकाराने त्यांना गाठून त्यांना कोर्टरूमचं वर्णन ऐकवलं. या वर्णनावरून त्यांनी कोर्टरूम मधला हुबेहूब प्रसंग चितारला होता. हे स्केच वर्तमानपत्रातही छापून आलं होतं.

नितीन यादव यांच्या कामाचा खरा कस लागतो तो संवेदनशील प्रकरणांमध्ये. बलात्कार पिडीत मुलीकडून गुन्हेगाराची माहिती काढून घेणे हा काहीसा क्रूर पण अपरिहार्य भाग असतो. अशा केसेस मध्येही नितीन यादव यांनी सफाईने माहिती काढून घेतली आहे. ‘’काहीवेळा चित्र एवढं ‘परफेक्ट’ असतं की पीडीत मुलीला अश्रू अनावर होतात’’ असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते..

१० वर्षापूर्वी कॅन्सरसाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती आणि ते नुकतेच बरे होत होते तेव्हा एक बलात्काराची केस त्यांच्याकडे आली. या केसमध्ये मुलगी कर्णबधीर आणि मुकबधीर होती. तिच्याकडून माहिती काढणं हे जवळजवळ अशक्य होतं. यावर त्यांना एक मार्ग सुचला. त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या शरीराच्या भागाचे जसे की चेहऱ्याचे, केसांचे, त्वचेच्या रंगाचे, जेवढे म्हणून चित्रांचे नमुने होते ते पिडीत मुलीच्या समोर ठेवले. मुलीने नमुन्यातील एकेक गोष्टींची निवड केली आणि गुन्हेगाराचा चेहरा तयार झाला. तो गुन्हेगार पुढील ७२ तासांच्या आत पोलिसांच्या ताब्यात होता.

त्यांच्या कामासाठी त्यांना मुंबई पोलीस खाते व शैक्षणिक खात्याचे मिळून १६४ पुरस्कार मिळाले आहेत. पोलिसांना मदत करण्यासोबत ते चेंबूर येथील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करतात. पोलीस खात्याशी निगडीत सगळ्यांनाच जीवे मारण्याची धमकी ही येतेच. याला नितीन यादवही अपवाद नाहीत. पण कोणताही अडथळा त्यांना त्यांच्या कामापासून लांब ठेवू शकला नाही.

२५ वर्षांपासून त्यांनी कामासाठी एक रुपयाही घेतलेला नाही पण मागील काही वर्षापासून पोलीस खाते स्वतःहून त्यांना पैसे देऊ करते.

बलात्काराच्या गुन्ह्याच्या बाबतीत त्यांची एक अट असते. एकदा का गुन्हेगार पकडला गेला की ते त्याला एक सणकून कानाखाली देणार. त्यांची ही अट पोलिसांनी चक्क मान्यही केली आहे.

तर मंडळी अशा या पडद्यामागच्या हिरोचं कौतुक करू तेवढं कमीच आहे. फक्त एवढंच म्हणू शकतो की ‘तुमच्या कामाला प्रणाम !!’… 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ज्ञानदेवांचा अद्वैतानुभव… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ ज्ञानदेवांचा अद्वैतानुभव… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

“पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती “ —  हा अभंग सर्वाना परिचित आहे. हा ज्ञानेश्वर माऊलीनी लिहिलेला अभंग आहे. या अभंगात आलेले दोन शब्द नेहमी  वेगळे वाटायचे, एक कानडा आणि दुसरा करनाटकु पण वाटायचे कानडा म्हणजे कानडी आणि करनाटकु म्हणजे कर्नाटक राज्यात. पण मग ज्ञानेश्वर महाराज का करतील असा उल्लेख? तेव्हा हे राज्य थोडी असेल. पण या शंकेचे निरसन झाले,  ४/५ वर्षांपूर्वी मला श्री. हृदयनाथ मंगेशकर यांना ऐकण्याचा योग आला, पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या कार्यक्रमात. तेव्हा त्यानी या शब्दांचा अर्थ असा सांगितला, ‘ कानडा म्हणजे अगम्य, समजायला अवघड, न कळणारा असा आणि  करनाटकु म्हणजे नाटकी, करणी करणारा असा.’  हे अर्थ समजल्यावर गाण्याची गोडी अजूनच वाढते. आज मी मला समजलेला अर्थ उलगडून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तो वाचल्यावर पुन्हा एकदा  गाणं ऐकत गाण्याच्या रसास्वाद घ्या. मनाला खूपच आनंद मिळेल. 

पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती। रत्नकिळ फाकती प्रभा। 

अगणित लावण्य तेज पुंजाळले। न वर्णवे तेथिची शोभा॥१॥

ज्ञानदेवांच्या दृष्टीपुढे सावळा पांडुरंग उभा आहे. विविध रत्नांची प्रभा फाकावी तशी पांडुरंगाची कांती दिव्य तेजाने झळकत आहे. ज्ञानदेवांचे अंतःकरण आत्मप्रकाशाने उजळून गेले आहे. विटेवर उभा असलेल्या पांडुरंगाच्या तेजःपुंज लावण्याची शोभा काय वर्णावी? त्यासाठी शब्द अपुरे पडतात. विठूचे हे तेजःपुंज सौंदर्य अगणित व असीम आहे.

कानडा वो विठ्ठलु करनाटकु। येणे मज लावियेला वेधु। 

खोळ बुंथी घेउनी खुणाची पालवी। आळविल्या नेदी सादु॥२॥ 

प्रकाशाचे अंग हे प्रकाशाचेच असते याप्रमाणे हा विठ्ठल कसा आहे? तर तेजःपुंज असा हा विठ्ठल, कानडा म्हणजे अगम्य, न कळणारा असा आहे. तो नाटकी (कर नाटकु)  आहे. अवघ्या विश्वामधे विविध रुपात (पशु, पक्षी,  माणूस सारे स्थिरचर) वावरणारा हा भगवंत नाटकी नाही तर काय आहे? सगळ्यांच्या भुमिका हाच तर करत असतो. त्याच्या या नाट्यावर तर मी भुलले आहे. माझे मन मोहून गेले आहे. त्याच्या या नाटकाचा मला वेध लागला आहे. त्याच्या नाटकाला अंत नाही की पार नाही. खोळ म्हणजे पांघरुण किंवा आवरण. प्रत्येक प्राणीमात्रांत तो आहे. विविध रुपाची कातडी पांघरुन (खोळ बुंधी घेवूनी), जणू काही तो माझ्याकडे पहा, मला ओळखा, मला ओळख असे सांगत आहे. एखाद्या लबाड मुलासारखा मला खुणावत आहे. पण हाक मारल्यावर मात्र ओ पण देत नाही ( आळविल्या नेदी सादु ). असा हा नाटकी पांडुरंग, आणि त्याच्या नाटकाबद्दल काय सांगू? विविध रुपाची खोळ घालून येत असल्याने त्याला ओळखताही येत नाही. असा हा कानडा म्हणजे कळायला मोठा कठीण आहे. 

शब्दविण संवादु दुजेवीण अनुवादु। हे तव कैसेंनि गमे। 

परेही परते बोलणे खुंटले। वैखरी कैसेंनि सांगे॥३॥  

प्रेमाच्या अभिव्यक्तीला शब्द कशाला हवेत. आईला, ‘बाळा माझे तुझ्यावर फार प्रेम आहे ‘, हे सांगावे लागते का? न बोलता तिच्या दृष्टीत ते ओथंबून वहात असते. तसेच आपल्या देवाशी बोलायला आपल्याला शब्द कशाला हवेत?  परा, पश्यंति, मध्यमा आणि वैखरी असे वाणीचे चार प्रकार आहेत. वैखरी म्हणजे शब्दात बोलतो ती, विचार करताना आपण आपल्याशी बोलतो ती भाषा म्हणजे  मध्यमा, पश्यंती म्हणजे ह्रुदयाची भाषा आणि आत्म्याशी संवाद करणारी वाणी म्हणजे परा वाणी. विठ्ठलाशी बोलताना परा वाणी सुद्धा मुक होते. बोलणे  खुंटते. शब्दावाचून संवाद होतो. जसे आईला तान्हुल्याला भूक लागली हे सांगावे लागत नाही,  शब्दावाचून कळते तसे परमात्म्याला भक्ताचे बोलणे. न बोलता कळते. एक बोलला तर दुसरा उत्तर देईल ना? दुजेपणाशिवाय बोलणे कसे होते हे परा वाणीला जेथे सांगता येत नाही तिथे वैखरीला (जीभेला) कसे बरे सांगता येईल?

पाया पडु गेले तव पाउलचि न दिसे। उभाचि स्वयंभु असे। 

समोर की पाठीमोरा न कळे। ठकचि पडिले कैसे ॥४॥ 

या विठ्ठलाचा नाटकीपणा किती सांगू? पायावर डोके ठेवायला गेले तर पाउलची न दिसे. समोर पहावे तर उभा आहे.  पण माझ्या समोर उभा  आहे की पाठमोरा उभा आहे हेच कळत नाही. माझ्या पुढे आहे की माझ्या मागे उभा आहे, खालून पाहतोय की वरून  हेच समजत नाही. अशाप्रकारे हा मला सारखा फसवत (ठकचि) आहे,  ठकवत आहे. आपल्या अवतीभवती सर्वत्र तोच व्यापून आहे एवढे खरे.

क्षेमालागी जीव उतावीळ माझा। म्हणवूनि स्फूरताती बाहो।

क्षेम देऊ गेले तव मीचि मी एकली।आसावला जीव रावो ॥५॥ 

त्याला आलिंगन देण्यासाठी माझा जीव उतावीळ झाला आहे. त्यासाठी माझे बाहु स्फुरण पावताहेत. मला वाटते एवढासा हा विठ्ठल  त्याला मिठी मारणे किती सोपे. त्याला मिठी घ्यायला गेले तर मीच एकटी उरले. हा नाटकी कुठे गेला कळलेच नाही. त्याला आलिंगन देण्याची इच्छा माझी अपुरी राहिली.

बाप रखुमादेवीवरु हृदयीचा जाणुनी। अनुभवु सौरसु केला। 

दृष्टीचा डोळा पाहों गेले। तव भीतरी पालटु झाला ॥६॥ 

हा विठ्ठल बाहेर नसून ह्रुदयात वसतो असे कळले म्हणून  त्याचा अनुभव घेण्यासाठी मी माझी दृष्टी आत वळवली तर काय माझे अंतरंगच बदलून गेले. आत तोच, बाहेर तोच, समोर तोच, मागे तोच, देह तोच आत्मा तोच. जिकडे पहावे तिकडे तोच. विश्वात तोच, विश्वापलीकडे तोच नाना मुखवटे घेवून त्याचे नाटक सुरूच आहे. वरवर पहायला जावे तर कसा कमरेवर हात ठेवून विटेवर निश्चल उभा आहे. जणू काही भोळा सांब. पण तुझ्यासारखा नाटकी दुसरा कोणी नाही. विश्वाची खोळ अंगावर घेऊन दडून काय बसतोस? माझ्यासारखीला दुरून काय खुणावतोस, हाक मारल्यावर गप्प काय बसतोस, पाया पडायला आलें तर पाऊले लपवतोस,  समोर- मागे येऊन काय ठगवतोस, क्षेम(मिठी) द्यायला गेले तर हृदयात काय लपतोस. कळली तुझी सारी नाटके. तू पक्का नाटक (करनाटकु) करणारा आहेस आणि  अनाकलनीय (कानडा) आहेस.   

ज्ञानदेव स्त्री(प्रकृती) भावाने विठ्ठलाशी(पुरुष =परमात्मा) बोलतात. हे बोलणे म्हणजे एका अंगी तक्रार आहे तर दुसरीकडे त्याची स्तुती केली आहे. ज्ञानदेवांचा अद्वैतानुभव, त्यांचा साक्षात्कार या अभंगात काव्यमय रीतीने शब्दबद्ध केला आहे.

राम कृष्ण हरी

याचसाठी गदिमा ‘ वेदांनाही नाही कळला अंतपार याचा ।। कानडा राजा पंढरीचा…।।’  असं म्हणतात.

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दान… दृष्टीचे ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ दान… दृष्टीचे 👁️ ☆ सौ कल्याणी केळकर बापट

(१० जून..आंतरराष्ट्रीय दृष्टीदान दिनानिमित्त)

नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन दरवर्षी 10 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या माध्यमातून लोकांमध्ये नेत्रदानाची जनजागृती केली जाते.

नेत्रदानाचे महत्व या बद्दलची जनजागृती करून लोकांना मृत्यूनंतर डोळे दान करण्याची प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करणे, हे दृष्टीदिनाचे उद्दिष्ट आहे. विकासशील देशांमध्ये प्रमुख सार्वजनिक आरोग्याच्या समस्यांपैकी अंधत्व ही मुख्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कार्निया संबंधित आजार, मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर होणाऱ्या दृष्टी हानि आणि अंधत्वच्या मुख्य कारणांपैकी आहे.

कुठलही दानं हे उत्स्फूर्तपणे करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यांना काही देऊ करतो त्या गोष्टींची आवश्यकता, गरज ही समोरील व्यक्तीला हवी. तुमच्याकडे अतिरिक्त असणाऱ्या गोष्टी दुसऱ्या ला फारशी गरज नसतांना देऊ करणे हे दान ह्या परिभाषे खाली नक्कीच येत नाही हे देणा-यांनी आवर्जून लक्षात ठेवावे.

नुकत्याच उमलू लागलेल्या आमच्या वयात “धनवान”ह्या चित्रपटातील “ये आँखे देखकर हम सारी दुनिया भूल जाते है”हे गाणे किंवा “आँखोंही आँखोमे ईशारा हो गया,बैठे बैठे जिने का सहारा हो गया”ह्यासारखी अवीट गोडीची अविस्मरणीय गाणी दिसण्याच्याही पलीकडील नजरेच,दृष्टी चं महत्व आम्हाला सांगू लागली. खरचं सगळ्या जगाची,ज्ञानाची, माहिताची ओळख पटविण्याचं काम हे डोळेच तर करतात. लहानसं इटुकलं पिटुकलं बाळ सुद्धा जन्म झाल्याबरोबर आपल्या मिचमिच्या डोळ्यांनी उजेडाचा क्षणभर त्रास सहन करीत अवतीभवतिच  हे जग बघायला सुरवात करतं. मग हळुहळू हे डोळे आपल्याला नुसतीच नजर, दृष्टी देतात असं नाही तर सभोवतालचे ज्ञान मिळवित एक नवा दृष्टिकोन पण देतात.

हे डोळेच तर आपल्याला नवनवीन संकल्पना सहज समजवायला मदत करतात , हे डोळेच आपल्याला नवनवीन क्षेत्रात प्रगती करायला मदत करतात, हे डोळेच आपल्याला ह्या आणाभाका, कस्मेवादे निभवायला शिकवितात. हे डोळेच आपल्याला परस्परांची ओळख पटवायला शिकवितात. त्याचबरोबर ह्या डोळ्यांनी स्वतःला कसं ओळखावं हे पण शिकवितात. ह्या डोळ्यांमध्येच आपल्याला माया,ममता,प्रेम दिसून येतं,जीवन खूप सुंदर आहे ह्याची ग्वाही पटते, तर कधीकधी ह्या डोळ्यांमध्येच आपल्याला चीड, राग,संताप दिसून आल्याने आपलं नेमकं कुठं, काय, किती चुकलं ते आपण शोधायला लागतो. ह्य डोळ्यां मध्येच कधी आपल्याला वासनेची झलक आढळून आल्यास आपण लगेच सतर्क होतो. खरोखरच हे डोळे आपल्याला सगळी ओळखं पटवून देऊन जगात सक्षमपणे जगणं शिकवितातं.

आपल्याला निरामय, अव्यंग,सुदृढ शरीर नशीबाने देवाने दिले तर आपल्याला त्या अवयवांच्या किंमतीचा अंदाजच लागत नाही. ज्या कुणाजवळ ह्यातील एखाद्या अवयवाचा जरी अभाव असेल तर त्यालाच त्याच्या खरी किंमत ही कळते.आजकाल बरीच जनजागृती झाल्याने, त्याचं महत्त्व पटल्याने लोक आजकाल अवयवदानाचा त्यातल्यात्यात नेत्रदानाचा संकल्प सोडतात.

मी माझ्यापुरती तरी नेत्रदानाची व्याख्या बदलली आहे. मी ह्याला नेत्रदान न म्हणता नेत्रभेट म्हणते. “दान दिले” ह्या संकल्पनेपेक्षा “भेट दिली”ही संकल्पना वापरल्याने माणसासाठी जास्त घातक असलेल्या “मी”पणा किंवा “अंह”चा स्पर्श होत नाही, शिवाय दान ह्याचा अर्थ तुम्हाला कामी असतांना, गरज असतांना सुद्धा तुम्ही ते दुस-याला दिले तर त्या त्यागाला दान म्हणणं उचित ठरेल. परंतु नेत्रदान तर आपण आपला शेवटला श्वास सोडल्यावर, त्यांची आपल्याला गरज संपल्यावर दुसऱ्या ला देतो म्हणून नेत्रभेट हे नाव जास्त समर्पक असं मला वाटतं.

त्या ईश्ववराची लीला पण अगाध असते बरं का,

एखादा अवयव नसलेल्या व्यक्तीत त्याची उणीव,कमतरता भरून काढायला पर्यायी ईश्वराने दुसरी एखादी शक्ती त्याला खास म्हणून दिलेली असते. त्यामुळे डोळे नसून सुद्धा दया, प्रेम,कणव, संस्कार, कृतज्ञता,समजूतदारपणा, सुसंस्कृतपणा ह्या बाबतीत अग्रेसर असलेल्या अंध व्यक्ती आपल्या सभोवती सहजतेने, विनातक्रार वावरतांना आढळतात.

आजच्या दिनी जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदानाचा संकल्प सोडून अंधांना दृष्टी देण्याचं मोलाचं कार्य करावं एवढचं मी म्हणेन.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “उद्धरेत आत्मना आत्मानम्।” ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆

सौ. अंजोर चाफेकर

 

??

☆ “उद्धरेत आत्मना आत्मानम्।” ☆ सौ. अंजोर चाफेकर

राजस्थान रॉयल्सचा कप्तान संजू सॅमसन याची परवा इन्स्टाग्रामवर पोस्ट बघितली.

त्याचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो, दूर लांबवर नजर आणि डोळ्यात आशेची चमक. 

त्याने खाली लिहिले होते,” वियप्पु थुनियित्ता कुप्पयम. “… म्हणजे माझा शर्ट माझ्या घामाने विणला आहे.

त्याला म्हणायचे होते, ‘ मी जो इथवर पल्ला गाठलाय तो केवळ कष्टाने, घामाने.आणि अजून खूप पुढे जायचे आहे.’ 

आयुष्यात पुढे यायचे असेल तर कष्ट आलेच. गीतेत कृष्णही हेच सांगतो, 

“उद्धरेत आत्मना आत्मानम् ।”….. स्वतःच स्वतःचा विकास करत रहा. 

विकासाचा रस्ता कायम अंडर कंस्ट्रक्शन असतो. अडचणींचे दगड, धोंडे ओलांडावे लागणार

…  रफाल नडाल, २२ वेळा ग्रॅन्ड स्लाम जिंकला. उत्तम टेनिसपटू. तरीही अपूर्णतेची हुरहुर. 

मनात जिद्द…. दोन,तीन महिन्यापूर्वी बेडरिडन होता. त्याची हिप सर्जरी झाली होती. त्याला स्वतःला तो टेनिस खेळू शकेल की नाही याची खात्री नव्हती. पण मनात दुर्दम्य इच्छा.मे महिन्यात पॅरीसमधे फ्रेन्च ओपन खेळण्याची. आणि तो इच्छाशक्तीच्या जोरावर पॅरीसमधे खेळला.

कृष्ण गीतेत सांगतो ….. 

आत्मनः म्हणजे मन बलवान करा. 

मन याचा अर्थ अंतर्मन….  सबकाॅन्शस माईंड. 

या मनात चांगले विचार, सकारात्मक विचार पेरत रहा. 

या अंतर्मनाची शक्ती इतकी अफाट आहे की ते विचार सत्यात उतरतील.Thoughts will turn into things.

जाॅर्ज वाॅशिंग्टन गरीब होता. एका शाळेत शिपायाची नोकरी करीत होता.शाळा सुटायच्या वेळी घंटा वाजविण्याचे काम त्याचे होते. घंटा वाजवताना तो मस्करीत म्हणायचा,

“टण,टण,अमेरिकेचा प्रेसिडेंट वाॅशिंग्टन. ” .. हे रोज म्हणता म्हणता तो विचार त्याच्या अंतर्मनात 

आपोआप झिरपत गेला.तो झपाटून गेला. त्याच्या कामाची व्याप्ती वाढली व तो खरोखर अमेरिकेचा अध्यक्ष झाला.

जसा समुद्रावरचा वारा जहाजाला कुठल्याही दिशेने भरकटवू शकतो तसेच मनही भरकटते.

पण जहाजाचे शीड जहाजाची दिशा ठरवते तसेच उत्तम विचार हे मनाच्या तारूची दिशा ठरवतात. 

कृष्ण नंतर हे ही सांगतो, “ न आत्मानम्अवसादयेत् l “ 

… स्वतःची अधोगती करू नका…… स्वतःला कमी लेखू नका….. न्यूनतेची भावना नको. 

… आपल्यातल्या उणिवा ओळखून त्या दुरुस्त करा.

थोडक्यात उन्नती साधायची असेल तर स्वतःचा कम्फर्ट झोन सोडावा लागतो. थोडी रिस्क घ्यावी लागते.

परवा आय.पी.एल. मॅचमधे विराट कोहली इतका तगडा बॅट्समन असूनही त्याला जाणवलं की स्पिनर्स- -समोर त्याचा स्ट्राईक रेट कमी होतो आहे. ही त्याची उणीव भरून काढण्यासाठी त्याने पंजाबसमोर खेळताना रिस्क घेतली. त्याने स्लाॅग स्वीपचा सरावही केला नव्हता. तरीही त्याने तो शाॅट मनात इमॅजिन करून मारला व सिक्सर्स घेतल्या.

थोडक्यात  परिस्थितीप्रमाणे स्वतःला ढाच्यात बसवता आले पाहिजे.

स्वतःच्या उन्नतीचा मार्ग आपणच शोधला पाहिजे……. 

©  सौ.अंजोर चाफेकर

मुंबई

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares