मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “एक बातमी आणि मी…”   ☆ श्री सुनील देशपांडे ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “एक बातमी आणि मी…”   ☆ श्री सुनील देशपांडे

गुरुवार दिनांक नऊ जानेवारी २०२५ रोजी इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था, यांनी एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग घडवून आणला. …. अंतराळात दोन उपग्रह एकमेकांना जोडण्याचा आणि पुन्हा एकमेकांपासून विभक्त करण्याचा हा तो प्रयोग म्हणजे ‘स्पॅडेक्स’.

अशा तऱ्हेने अंतराळात उपग्रह एकमेकांना जोडणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. त्याचप्रमाणे अंतराळामध्ये चवळीचे बी रूजवून त्यांना मोड आणि पाने फुटल्याचा सुद्धा एक यशस्वी प्रयोग याआधी संस्थेने घडवून आणला आहे.

खरं म्हणजे इस्रो या संस्थेची सुरुवातीपासून आतापर्यंतची यशस्वी घोडदौड हा सर्व माध्यमांचा सर्वात जास्त आकर्षणाचा विषय असला पाहिजे. एखादी कादंबरी अथवा सिनेमाची कथा किंवा एखादी फॅन्टसी म्हणजेच अद्भुतकथा म्हणून सुद्धा ती खूप आकर्षक आहे. असे असताना एवढी महत्त्वाची मोठी बातमी लोकांना आकर्षक आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा एखादा कार्यक्रम म्हणजे एखाद्या अद्भुत कथेच्या कथाकथनाचा कार्यक्रम होऊ शकेल.

देशात बनलेला पहिला उपग्रह आर्यभट्ट, देशामध्ये बनलेले पहिले रॉकेट पीएसएलव्ही, मंगळयान, चांद्रयान आणि आत्ताचा हा स्पॅडेक्स हे प्रकल्प म्हणजे आपल्या आगामी चांद्र मोहिमेची यशस्वी पूर्वतयारीही नक्कीच म्हणता येईल. तसेच हे सर्व प्रयोग म्हणजे भारताकडे आता अंतराळातील प्रयोगशाळा उभारण्याची संपूर्ण क्षमता आली आहे याची खातरजमा आहे.

एच जी वेल्सच्या कल्पनेपेक्षाही सुरस अशा या कथा. कथा कसल्या? प्रत्यक्ष घटनाच. आपल्या देशातील तरुणांना केवढी मोठी प्रेरणा देऊ शकतील याची कुणाला जाणीव का होत नाही? 

दुसरा एक विचार मनात येतो आपल्या देशात सर्व सरकारी यंत्रणा अनेक वेळा अनेक अनैतिक चक्रात सापडलेल्या, प्रचंड नुकसानीत सापडलेल्या किंवा बंद पडलेल्या दिसून येतात. पण ही संस्था अशी नासली नाही, दुराचाराने ग्रासली नाही. हे सुद्धा आपल्या शास्त्रज्ञांचे फार मोठे यश म्हणता येणार नाही काय?

खरं म्हणजे माझ्या दृष्टीने गुरुवारची स्पॅडेक्स संबंधीची बातमी सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी. निदान भारतीय माध्यमांनी तरी या बातमीची मोठ्या प्रमाणावर दखल घ्यायला हवी होती. माझ्या दृष्टीने सगळ्या वर्तमानपत्रांची मथळ्याची बातमी (हेड लाईन) ही असायला हवी होती. सगळ्या वाहिन्यांवर दिवसभर ही बातमी प्रामुख्याने झळकायला हवी होती. त्यावर सतत चर्चा किंवा चर्चासत्रे आणि व्याख्याने यांचे आयोजन केले जायला हवे होते. ज्या काही बातम्या आपल्या सर्व वाहिन्यांवर झळकत आहेत त्यापेक्षा कितीतरी महत्त्वाची आणि अभिमानाची ही बातमी सर्वांच्या दृष्टीनेच असायला हवी होती. वृत्तपत्रांनी कुठेतरी कोपऱ्यात किंवा ई-आवृत्तीमध्ये चार ओळीत या बातमीची वासलात लावली. मराठी वाहिन्यांवर तर मला कुठेच ही बातमी आढळली नाही. अर्थात कुणीतरी कुठेतरी एक दोन वाक्यात ती गुंडाळली असण्याची शक्यता आहे. पण ती दिवसभर सतत दाखवण्यासारखी महत्त्वाची बातमी नक्कीच होती. त्या प्रयोगाचे काय झाले हे जाणून घ्यायला मी इच्छुक होतो. म्हणून अनेक वाहिन्यांवर फिरलो. परंतु गुरुवारी काही मला ती बातमी समजू शकली नाही. शुक्रवारी व्हाट्सअप वर किंवा गुगल वर ही बातमी शोधून सापडली. अशी बातमी शोधावी लागते हे आपले आणि आपल्या देशाचे दुर्दैव आणि माध्यमांचा नाकर्तेपणा समजावा काय?

खरे म्हणजे सगळ्या मराठी वाहिन्यांनी त्यांचा वार्ताहर स्वतंत्रपणे बेंगलोरला पाठवून इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या मुलाखती घेणे, ही माहिती मिळवून प्रस्तुत करणे, अशा प्रकारे खूप काही करणे आवश्यक होते. आपल्या देशाच्या दृष्टीने आणि संपूर्ण जगाच्या दृष्टीने सुद्धा या बातम्यांना मोठे महत्त्व आहे हे आपल्या स्वकीयांना समजेल तो सुदिन.

आदरणीय पूर्व राष्ट्रपती श्री अब्दुल कलाम यांनी इस्रायलच्या भेटीतील त्यांची एक आठवण सांगितली होती. इस्रायलमध्ये ते गेले असताना त्यावेळी इस्राईलचे युद्ध चालू होते. परंतु जेव्हा त्यांनी सकाळी तेथील वर्तमानपत्र पाहिले, तेव्हा वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर मथळ्याच्या बातमीवर (हेडलाईन वर) त्या देशामध्ये एका शेतकऱ्याने शेतीचा एक यशस्वी प्रयोग करून दाखवला त्याबद्दलची माहिती व फोटो संपूर्ण पहिले पान त्या प्रयोगावर आधारले होते. युद्धाच्या बातम्या आतील पानांवर होत्या. कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे हे जेव्हा आपल्या माध्यमांनाही समजेल तो सुदिन.

सध्या आपण आपल्या देशाच्या भावी पिढ्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून भविष्याकडे नजर लावून आशावाद जपायला हरकत असू नये असे वाटते. आपण आपल्या आयुष्यात या राष्ट्रासाठी फारसे काही करू शकलो नाही असे वाटणाऱ्या माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांनी जाता जाता निदान या आशेचा सुगंध वातावरणात पसरून जावे एवढी तरी इच्छा धरू या !

© श्री सुनील देशपांडे 

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आपल्या मनासारखे वागावे का दुसऱ्याच्या मनासारखे ? – लेखक – अज्ञात ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

आपल्या मनासारखे वागावे का दुसऱ्याच्या मनासारखे ? – लेखक – अज्ञात ☆ श्री अनिल वामोरकर ☆

आपल्या मनासारखे वागावे का दुसऱ्याच्या मनासारखे ?

बायकोनं घरात मांजर पाळलेलं. तिचं ते खूप लाडकं. ती जेवायला बसली की तिलाही घेवून बसायची. एका वाटीत दूध भाकर कुस्करुन द्यायची.

पण नवऱ्याला ते मांजर अजिबात आवडायचं नाही. उघडं दिसेल त्या भांड्यात तोंड घालायची त्याला सवय. त्याचा त्याला प्रचंड राग यायचा…

एकदा नवरा जेवायला बसलेला, आणि नेमकं मांजराने त्याच्या ताटात तोंड घातलं. नवरा चिडला आणि रागारागाने शेजारी असलेला पाटा त्याच्या डोक्यात घातला.

घाव वर्मी बसल्याने मांजर बराच वेळ निपचित पडून राहीलं. ‘मेलं की काय’ अशी शंका येत असतांनाच ते अंग झटकून उठून बसलं.

त्याने हळूच नवऱ्याकडे हसून बघीतलं, आणि चक्क ‘शॉरी यार, मी मघाशी तुझ्या ताटात तोंड घातलं. क्या करे आदत से मजबूर हूँ, पुन्हा नाही असं करणार.. ‘ असं माणसासारखं बोललं. नवरा वेडा व्हायचाच बाकी.. !

त्यानंतर मांजर नम्र आणि आज्ञाधारक झालं. ताटात तोंड घालणे तर सोडाच, दारातला पेपर आणून दे, टी पॉय वरचा चष्मा आणून दे… अशी बारीकसारीक कामं ते करू लागलं.

मग काय, नवऱ्याची आणि त्याची छान गट्टी जमली. ऑफिसमधून येताच मांजर दिसलं नाही की तो अस्वस्थ व्हायचा. ‘अग मन्या दिसत नाही गं कुठं ?’ बायकोला सतत विचारत राहायचा.

असेच काही दिवस गेल्यावर एकेदिवशी सोसायटीच्या गेटसमोर बेवारस कुत्री आणि मांजरं पकडून नेणारी महापालिकेची व्हॅन येऊन थांबली.

मन्याने खिडकीतून ती व्हॅन बघितली. त्याच्या मनात काय आलं कोण जाणे, पण धावत जावून तो व्हॅन मधे बसला.

नवऱ्याने हे बघितले. हातातला पेपर पटकन बाजूला टाकून तो मन्यामागे धावला. मन्या व्हॅनमध्ये निवांत बसलेला.

नवरा म्हणाला, “मन्या, अरे इथं गाडीत का बसलायस? ही गाडी बेवारस मांजरासाठी आहे. तुझ्यासाठी नाही. “

“मला माहितेय.. ! पण मला जायचंय आता. ” मन्या शांतपणे बोलला.

“मन्या, अरे असं काय करतोस? तू किती लाडका आहेस आम्हा दोघांचाही. माझं तर पानही हालत नाही तुझ्याशिवाय. तू क्षणभर नजरेआड गेलास तरी मला करमत नाही. मी इतकं प्रेम करतो तुझ्यावर आणि तू खुशाल मला सोडून निघालास ? ए प्लिज, प्लिज उतर रे आता. ” काकुळतीला येवून नवरा बोलला.

मन्या गोड हसला, आणि बोलला, “तू माझ्यावर प्रेम करतोस? माझ्यावर?”

“म्हणजे काय शंकाय का तुला?”

“मित्रा, अरे मी जेंव्हा माझ्या मनासारखं वागत होतो, हवं तिथं हवं तेंव्हा तोंड घालत होतो, तेंव्हा मी तुझा नावडता होतो. सतत रागवायचास माझ्यावर. अगदी माझ्या जीवावर उठला होतास तू एकदा

पण जेंव्हा मी तुझ्या मनासारखं वागू लागलो, तुला हवं तसं करू लागलो…. तेंव्हा तुला आवडू लागलो. तू माझ्यावर प्रेम करू लागलास, यात नवल ते काय?”

नॉट सो स्ट्रेंज यार… !!

वपुंची ही कथा खूप काही सांगून जाते……

जेंव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो, तेंव्हा ते खरंच त्याला बरं वाटावं म्हणून, की स्वतःला बरं वाटावं म्हणून करतो ?

समोरचा जो पर्यंत आपल्या मनासारखं वागत असतो, तोपर्यंत त्याच्यावर आपलं प्रचंड प्रेम असतं. कारण त्याचं वागणं आपल्याला सुखावणारं असतं.

पण जेंव्हा तो आपलं ऐकत नाही, आपल्याला हवं तसं वागत नाही, तेंव्हा त्याचं आपल्या सोबत असणंही आता नकोसं वाटतं. त्याला टाळत राहतो.

भेटलाच कधी तर त्याच्यावर चिडतो, रागावतो. त्यानं नाहीच ऐकलं की मग वर्मी घाव घालून नातंच संपवून टाकतो. ज्याच्यावर जीवापाड प्रेम असतं, त्याला क्षणात परकं करून टाकतो.

आश्चर्य आहे ? का वागतो असं आपण ? त्याच्यावर खरंच आपलं प्रेम असतं की निव्वळ time pass म्हणून केलेली खोटी भावनिक गुंतवणूक?

आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कुणीही प्रेम करतं.

अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं, त्याला समजून घेणं, जेंव्हा तो आपल्या मनासारखं वागत नसतो..

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “नवीन वर्षाचा कागद…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “नवीन वर्षाचा कागद…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

खरंतर त्या कागदाबद्दल इतकं बोलण्यासारखं काहिच नव्हतं. पण एखादी गोष्ट उकरुन काढणे म्हणजे काय? याचा अनुभव परत एकदा आला. प्रत्येक काही दिवसांनी एक तिथी परत परत येते, तितक्याच सहजतेने हा उकरुन काढण्याचा अनुभव काही कालावधीनंतर परत येतोच. कधी तो येतो, तर काही वेळा आणण्यात आपणही मागे नसतो….. असो.

 लिहिलेल्या काही जुन्या कागदांना खूपच महत्त्व प्राप्त होतं. अर्थातच ते कोणी लिहिले, त्यात काय आहे, आणि कोणाच्या हाती लागले आहे यावर सुध्दा ते अवलंबून असतं. पण यांचं तसं नव्हतं…….

 माझ्या हस्ताक्षरातले असेच काही कागद घरातल्या अशा माणसाच्या हाती लागला, की त्याला महत्त्व येण्याऐवजी त्याचा विनोद झाला. आणि मग वाद……

 तुमच्या या कागदांना रद्दीत सुध्दा जागा नाही. असं म्हणत ते वाचले जात होते. अगदी तारीख आणि वर्ष यासकट.

 कागदावरच्या बऱ्याच गोष्टी सारख्याच असल्या तरी तारखेनुसार त्याच्यातलं अंतर एक वर्ष इतका मोठ्ठा काळ दाखवत होतं. म्हणजे वाढदिवस साजरा केला असता तर त्यातले काही कागद एकविस वर्षांचे सुद्धा झाले असते.

 यातही मी वर्षभरानंतर बऱ्याच गोष्टी तशाच लिहू शकतो, याच कौतुक न करता तेच तेच लिहिण्यात काय अर्थ? जे आपण करतच नाही……… असा उपहास होता. आणि अक्षराबद्दल तर एक अक्षर तोंडातून निघालं नाही. खरंतर माझ्या अक्षरावरून मी साक्षर आहे हे तिला मान्यच नाही.

 हा अक्षर, साक्षर, मधला क्ष, आणि गणितातला क्ष तेव्हापासूनच अक्षरशः माझ्या बाबतीत यक्षप्रश्न आहे.

 म्हणजे क्ष किरण यंत्राने काही गोष्टी समजतील. पण माझं लिहिलेलं समजणार नाही.

 आता एक वर्ष अंतर असणाऱ्या कागदावर काय वेगळं लिहिलेलं असणार….. नवीन वर्षात नियमितपणे करायच्या, आणि निग्रह करून सोडायच्या गोष्टी त्यात होत्या.

 यातल्या करायच्या गोष्टींचा निग्रह होत नव्हता, तर काही गोष्टी सोडल्याचा ग्रह मी करुन घेतला होता.

 ज्या गोष्टी करायच्या नाहीत ती व्यसनं आणि सवयी अर्थात वाईट सवयी आहेत असं इतरांच म्हणणं. आता हे इतर एकच असतील तरी त्यांचं म्हणणं हेच बहुमतासारखं असतं असं नाही, तर तेच बहुमत असतं यात शंका नाही……

 करायच्या काही गोष्टींमध्ये ज्या करायच्या होत्या त्याच्या विरुद्ध साहजिकच सोडायच्या होत्या. जसं सकाळी लवकर उठायचं म्हणजेच उशिरापर्यंत झोपणं सोडायचं होतं. ज्याला लोळत पडणं हा शब्द माझ्यासाठी घरात वापरला जातो.

 हळू आणि शक्यतो गोड आवाजात बोलायचं. म्हणजेच मोठ्याने बोलायचे तर नाहीच, पण बोलण्यातला ताठपणा सुद्धा सोडायचा हे ओघाने आलंच होतं. हे वाचतांना समोरचा आवाज उगाचच हुकूमशहा सारखा वाटला.

 नियमितपणे सूर्य नमस्कार घालणे. असंही त्यात होतं. नमस्कार करणे आणि घालणे यात फरक असतो. हे सुद्धा मला समजवून देण्यात आलं. आणि एक नमस्कार सुध्दा झाला. अगदी कोपरापासून. आता हा नमस्कार केला, की घातला हे मी ठरवेन…. पण नमस्कार करतेवेळी तेव्हाच तीच रुप मला सकाळच्या सूर्यासारखं तेजस्वी वाटलं……. आणि माझा चेहरा अस्ताला जाणाऱ्या सूर्यासारखा शांत वाटला……

 अन्न हे पूर्ण ब्रह्म…… उदर भरण नोहे……. याचा दाखला देत. जेवायला काय आहे? हे विचारायचं नाही. म्हणजेच जे मिळेल ते खायचं. आपल्या घरातलं चांगलच असतं. असं मीच लिहिलं होतं. पण…..

 हे वाचतांना त्यांचा रोख जिभेच्या पुरवलेल्या लाडामुळे माझ्या वाढलेल्या पोटाकडे होता.

 विकएंडला एकट्याने जायचं नाही. म्हणजेच जोडीने आणि गोडीने जायचं. हे फक्त लिहिलेलंच होत…… अंमलबजावणी व्हायची होती……

 म्हणजे वरच्या काही गोष्टी मी ठरवणार होतो, पण यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी करायलाच पाहिजेत हे माझी परवानगी न घेता ठरवण्यात आलं होतं. आणि तेच त्या कागदांवर माझ्याकडून लिहिलं (गेलं) होत. अशा छोट्या छोट्या पण मोठ्या वाटणाऱ्या बऱ्याच गोष्टी होत्या.

 नंतर नंतर तर कागदावर लिहिलेल्या गोष्टी वाचण्याचा वेग इतका वाढला, की काही गुंतवणुकीच्या जाहिरातीत शेवटी फक्त नियम आणि अटी लागू हेच समजतं, बाकी सगळं कानावरून जात, तसंच सगळं कानावरून गेलं. फक्त शेवटचा सोडलेला उसासा तेवढा समजला.

 असो…… आता तसाही त्या कागदांचा उपयोग नसला तरी यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी तशाच, पण चांगल्या अक्षरात परत लिहून काढेन. पण पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला………

 तो पर्यंत संदर्भ म्हणून गरज वाटली तर हे कागद आहेतच……….

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फाटकी नोट… ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

??

☆ फाटकी नोट… ☆ श्री मंगेश मधुकर

कडक उन्हाळ्याचे दिवस, ऑफिसच्या कामासाठी भर उन्हात बाहेर पडावं लागलं. गाडी चालवायचा कंटाळा आला म्हणून रिक्षा केली. तासाभरात काम आटपून परत ऑफिसला निघालो दहा मिनिटं झाली तरी रिक्षा मिळेना. चार-पाच जणांनी ‘नाही’ म्हटलं. ऑनलाइन बुकिंग पण होत नव्हतं. चिडचिड वाढली. काही वेळाने एक रिक्षा थांबली. लाल रंगाचा शर्ट,जीन्स,मानेपर्यंत वाढलेले केस अशा हँकी-फिंकी तरुण ड्रायव्हरला पाहून खात्री झाली की नकार येणार पण तो चक्क तयार झाला. त्याचा विचार बदलायच्या आधी लगबगीनं रिक्षात बसलो.

“थॅंक्यु दादा,बराच वेळ थांबलो होतो. कोणी यायला तयार नव्हतं. ”

“रिक्षासाठी पॅसेंजर म्हणजे देव. त्याला नाही म्हणायचं नसतं” रिक्षावाल्याकडून अनपेक्षित उत्तर.

“तुमच्यासारखा विचार केला तर प्रॉब्लेमच नाही पण इथं प्रत्येकाला लांबचं भाडं पाहिजे. मोबाईल नाहीतर गप्पा मारत टाईमपास करतील पण कामं करणार नाही. ”

“काहीजण तर रिकामी गाडी चालवतात पण जवळचं भाडं घेत नाहीत. अशांमुळेच पब्लिक रिक्षावाल्यांना सरसकट शिव्या घालतं. ”रिक्षावाला मार्मिक बोलत होता. चांगलाच समजूतदार निघाला. गप्पांच्या नादात कधी उतरायचं ठिकाण आलं कळलचं नाही.

“एकशे तीन झालेत. ऑनलाइन पेमेंट करतो. ”मी

“साहेब,आजची भवानी तुमच्याकडूनच. कॅश असेल तर द्या. ”

“ओके” मी पाकीटात पाहिलं तर शंभरच्या तीन नोटा होत्या. एक नोट काढली पण त्याक्षणी मनात आलं की आपल्याकडची फाटकी नोट खपवावी म्हणून मधोमध फाटेलली पण चिकटपट्टी लावलेली नोट पुढे केली. रिक्षावाल्यानं आधी हँडलला मग कपाळाला लावून नमस्कार करून नोट खिशात ठेवली. त्यावेळी मी तीन रुपयांसाठी खिसे चाचपडत होतो.

“साहेब,राहू द्या ” 

“नाही असं कसं,कष्टाचे पैसे आहेत”

“पुन्हा भेटलो की द्या ” छान हसत त्यानं रिक्षा सुरू केली आणि काही क्षणातच दिसेनासा झाला.

मी एकटक पाहत राहिलो. पेहरावाच्या अगदी विरुद्ध टोकाचं रिक्षावाल्याचं आदबीचं बोलणं आणि वागणं यामुळे भारावलो. त्याच्याविषयी प्रचंड आदर वाटायला लागला आणि एकदम आपण केलेली घोडचूक लक्षात आली. अरे बापरे !! स्वार्थाच्या नादात काय करून बसलो. रिक्षावाला माझ्याशी चांगला वागला आणि मी काय केलं तर फाटकी नोट देऊन त्याला फसवलं. स्वतःची लाज वाटायला लागली. प्रचंड राग आला. अस्वस्थ झालो. काय करावं सुचेना दुसरी नोट देऊन चूक सुधारावी असं डोक्यात आल्यानं तिरमिरीत गाडी घेऊन निघालो.

काळ्या हुडची रिक्षा,नंबर माहिती नाही आणि लक्षात राहिलेला ड्रायव्हर, एवढ्या भांडवलावर शोधाशोध सुरू केली. चार-पाच चौक फिरलो. रस्त्यावरची प्रत्येक रिक्षा निरखून पाहत होतो. रिक्षा स्टँड,दुकानं,पान टपरीवर चौकशी केली पण उपयोग झाला नाही. खूप निराश झालो. अपराध भाव वाढला. फाटकी नोट बघितल्यावर तो भला माणूस आपल्याविषयी काय विचार करत असेल या जाणिवेनं बेचैनी वाढली. जवळच्या दोन-चार किलोमीटर परिसरातील जागांवर चकरा मारून अर्धा-पाऊण तासानं ऑफिसमध्ये आलो. चेहरा बघून सहकाऱ्यांनी “काय झालं” म्हणून विचारलं.

“काही विशेष नाही. नंतर सांगतो म्हणत बोलणं टाळलं आणि कम्प्युटर सुरू केला पण चित्त थाऱ्यावर नसल्यानं कामात लक्ष नव्हतं. वारंवार चुका व्हायला लागल्या.

“काय साहेब,तुमच्यासारख्या जंटलमनकडून ही अपेक्षा नव्हती” फाटकी नोट हातात घेऊन बोलणारा रिक्षावाला सारखा डोळ्यासमोर यायला लागला.

तब्येत ठीक नाही कारण देऊन ‘हाफ डे’ सुट्टी घेऊन घरी आलो. मला अवेळी आलेलं पाहून बायकोला आश्चर्य वाटलं पण तिनं लगेच काही विचारलं नाही. थोड्यावेळानं बायकोला घडलेला सगळा प्रकार सांगितल्यावर काहीच प्रतिक्रिया न देता ती एकटक माझ्याकडे पाहत राहिली.

“काय झालं असं का पाहतेस”

“साध्या साध्या गोष्टींचा किती त्रास करून घेतोयेस”

“तुला वाटती तितकी साधी गोष्ट नाहीये. एका चांगल्या माणसाला फसवलं”

“इट्स ओके,ठिक आहे. तुला चूक कळली. सुधारायचा प्रयत्न देखील केलास यातच सगळं आलं”

“अगं पण”

“असं होतं. ठरवून नाही परंतु एखाद्या क्षणी मोहाला भुलून जाणीवपूर्वक चुकीचं वागतो नंतर त्याचा खूप पश्चाताप होतो मग स्वतःलाच दोष देतो अशावेळी फक्त मनस्तापा शिवाय काही हाती लागत नाही. प्रत्येकाला हा अनुभव येतो ”.

“पण माहिती असूनही मी मुद्दाम वागलो याचाच जास्त त्रास होतोय. ”

“बास आता !! जे झालं ते झालं त्यावर उगीच जास्त विचार करू नकोस. आपल्याला मिळालेली फाटकी नोट दुसऱ्याच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न सगळेच करतात. म्हणून म्हणते तू फार मोठा गंभीर गुन्हा केलायेस असं काही नाही आणि शंभर रुपयांसाठी इतका त्रास करून घेतलाय तो पुरेसा आहे. ”

“रिक्षावाल्याचं नुकसान झालं ना”

“मग भरून देऊ. भरपाई म्हणून डबल पैसे देऊ. ”

“हा बरोबर. असंच करू”

“चल. त्याला पैशे देऊ आणि सॉरी सुद्धा म्हणू. ” बायको उपहासानं म्हणाली.

“पण तो भेटणार कसा? हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे ना ” मी विचारलं.

“अरे सोन्या !!,एवढं कळतयं ना मग कशाला जीव जाळतोस. एक काम कर, त्याची मनापासून माफी माग म्हणजे बरं वाटेल आणि आता हा विषय सोडून दे. होतं असं कधी कधी….. ”

बायकोनं समजावल्यानं अपराधभाव बऱ्याच कमी झाला तरी सल कायम होती. बरोब्बर शंभर दिवस झालेत अजूनही तो रिक्षावाला भेटलेला नाही. कधी भेटेल ते माहिती नाही. मी मात्र अजूनही आशा सोडलेली नाही. या दरम्यान अजून एक फाटकी नोट पाकिटात आली. ती मात्र घरातच ठेवलीय…..

उगीच पुन्हा…..

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “’नारी शक्ती दिवस…” ☆ सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “नारी शक्ती दिवस…☆ सुश्री शोभा जोशी ☆

राणी मां गाईदन्ल्यू

“नारी शक्ती दिवस …”

हम इस देश की नारी है!

फूल नही चिंगारी है

असं गर्वाने सांगणार्‍या या पराक्रमी स्रियांचा सन्मान करण्यासाठी वनवासी कल्याण आश्रमातर्फे २६ जानेवारी हा दिवस ‘नारी शक्ती दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. आपला पराक्रम सिध्द करणार्‍या अनेक स्रिया आपल्या देशात होऊन गेल्या. अगदी देवी देवतांपासून अलिकडच्या स्रियांपर्यंत. अगदी जनजातीतील स्रिया सुध्दा याला अपवाद नाहीत.

२६ जानेवारी हा दिवस ‘ नारी शक्ती दिवस ‘ म्हणून का निवडला?जी महिला ब्रिटिशांविरूध्द लढा देताना ऐन तारूण्यात १४ वर्षं ब्रिटिशांच्या कैदेत राहिली, त्या राणी मां गाईदन्ल्यूंचा २६ जानेवारी हा जन्मदिवस.

पूर्वेकडील मणीपूर राज्यात, काला नागा पर्वतांची रांग आहे. तेथील लंकोवा गावामध्ये,रोंगमै जनजातीतील लोथोनाग व करोतलीन्ल्यू या दांपत्त्याच्या पोटी,२६ जानेवारी १९१५ ला गाईदन्ल्यूचा जन्म झाला. ७ बहिणी व १ भाऊ असा त्यांचा परिवार होता. गाईदन्ल्यूचा अर्थ चांगला मार्ग दाखविणारी. ‘ मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ‘ या म्हणीनुसार,गाईदन्ल्यू लहानपणापासूनच स्वतंत्र विचाराच्या,दृढ इच्छाशक्ती असलेल्या,प्रतिभासंपन्न आणि चिंतनशील होत्या. आपल्या संस्कृतीवर, धर्मावर होणारं ख्रिश्र्चनांचं आक्रमण त्या पाहात होत्या. म्हणून आपल्या संस्कृतीचं, धर्माचं इंग्रजांपासून संरक्षण करणं,रूढी परंपरा टिकवून ठेवणं,अंधश्रध्दा दूर करणं,तसंच ब्रिटिशांना आपल्या देशातून हाकलवून लावणं हे ध्येय त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षांपासून उराशी बाळगलं होतं.

‘हेरका’ या धार्मिक आणि नंतर स्वतंत्रता आंदोलनाकडे झुकलेल्या आंदोलनाचा प्रणेता,गाईदन्ल्यूंचा चुलत भाऊ,हैपोऊ जादोनांगला ब्रिटिशांनी फासावर लटकावले आणि वयाच्या १६ व्या वर्षी या लढ्याचे नेतृत्व गाईदन्ल्यूंकडे आले.

इंग्रजांना टॅक्स न देण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले. साथीदारांच्या साथीने,गनिमी काव्याने इंग्रजांवर हल्ले केले. असे करून त्यांनी इंग्रजांच्या नाकात दम आणला. त्यांना पकडण्यासाठी आधी २००/- रू. आणि नंतर ५००/- रू. बक्षीस जाहीर केलं पण त्या इंग्रजांच्या हाती लागल्या नाहीत.

१६ फेब्रु. १९३२ रोजी आसाम रायफल्सच्या सैनिकांबरोबर त्यांची लढाई झाली. त्यावेळीही इंग्रजांना त्यांना पकडता आले नाही. पण पोलोमी गावी आऊट पोस्ट बनवत असताना,एका बेसावध क्षणी त्या पकडल्या गेल्या. त्यांनी १४ वर्षं तुरूंगवास भोगला.

१९३७ साली पं. नेहरूंनी शिलाॅंगच्या तुरूंगात त्यांची भेट घेतली. त्यांचा पराक्रम पाहून, ‘ आपण तर नागांची राणी आहात ‘या शब्दात त्यांचा गौरव केला. राणी माॅं गाईदन्ल्यूची तुरूंगातून सुटका करावी,ही नेहरूंची मागणी ब्रिटिशांनी धुडकावून लावली. स्वातंत्र्यानंतर त्यांची तुरूंगातून सुटका झाली.

सूर्याला तात्पुरते ग्रहण लागले म्हणून तो कायमचा निस्तेज होत नाही. तसेच तुरूंगातून सुटल्यावर राणी माॅं पुन्हा झळाळून उठल्या. त्यांनी स्वतःला समाजकार्याला वाहून घेतलं. १९८५ साली वनवासी कल्याण आश्रमाच्या भिलाई येथे झालेल्या पहिल्या महिला संमेलनास त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. १७ फेब्रु. १९९३ रोजी त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ भारत सरकारने एक टपाल तिकिट काढले. त्यांचे देशासाठीचे योगदान पाहून त्यांना ताम्रपट देऊन गौरवण्यात आले होते.

जनजातीमध्ये इतरही अनेक स्रियांनी मुघलांविरूध्द आणि इंग्रजांविरूध्द लढताना परा क्रम गाजवला आहे. वेळप्रसंगी प्राणांचे बलिदान दिले आहे. उदा.

महाराणी दुर्गावती. – ५ आॅक्टोबर १५२४ ला गोंंडवनातील कालिंजर किल्ल्यात जन्मलेली दुर्गावती पुढे गढमंगला राज्याची राणी झाली. या कुशल प्रशासक,पराक्रमी, शूर वीर राणीने अकबराच्या सैन्याचा युध्दात दोनदा पराभव केला. तिसर्‍या वेळी हार समोर दिसत असताना,ती बादशहा अकबराला शरण गेली नाही. तिने स्वतःच्या छातीत खंजीर खुपसून मरण जवळ केले.

झलकारीबाई – 

‘दैवायत्त कुले जन्मं

मदायत्तं तु पौरूषम् ‘

माझा जन्म कुठल्या कुळात व्हावा हे हातात नसलं तरी जन्म कसा घालवावा हे आपल्याला ठरवता येतं. ही उक्ती खरी करून दाखवली ती झलकारीबाईंनी. बुंदेल खंडातील भोजला गावामध्ये जनजातीतील एका निर्धन कोळी कुटूंबातील,खांदोबा आणि धनिया या दाम्पत्यापोटी २३ नोव्हेंबर १८३० रोजी जन्मलेल्या झलकारीबाई पुढे राणी लक्ष्मीबाईंच्या ‘दुर्गा ‘ नावाच्या सेनेच्या महिला तुकडीच्या सेनापती झाल्या. तलवारबाजी,बंदुका, तोफा चालविण्यात त्या पटाईत होत्या. झाशीच्या किल्ल्यावर इंग्रजांनी केलेल्या हल्ल्याच्या वेळी,राणी लक्ष्मीबाईंच्या जीवाला धोका आहे हे झलकारीबाईंच्या लक्षात आले. त्यांनी राणींच्या दत्तक पुत्राला घेऊन,किल्ल्यातून बाहेर पडण्याचा सल्ला राणींना दिला.

झलकारीबाई आणि राणींच्या चेहर्‍यात खूप साम्य असल्याने त्या राणींच्या वेशात इंग्रज सैन्याला सामोर्‍या गेल्या आणि राणी लक्ष्मीबाईंचे प्राण वाचवले.

फुलो आणि झानो – संथाल परगण्यातील सिध्दो – कान्होंच्या या बहिणी कुर्‍हाडीने शत्रूला मारण्यात तरबेज होत्या. त्यांनी इंग्रज आणि जनतेच्या शोषणकर्त्या जमीनदारांविरूध्द सशस्र संघर्ष केला.

अंदमानची लीपा,मिझोरामची राणी रोपुईलियानी,अरूणाचलच्या सीमावर्ती भागातील नीरा आणि सेला,छत्तीसगड मधील दयावती कंवर, राजस्थानची कालीबाई,उत्तराखंडची गौरादेवी,गोंडवनाची राणी फुलकंवर इ. या निरनिराळ्या राज्यातील सर्व स्रियांनी इंग्रजांविरूध्द लढा दिला आहे. जनजातीतील अशा अजून कितीतरी स्रिया आहेत.

या अधुनिक काळातील महिलाच पराक्रमी होत्या असं नाही. तर वारसा अगदी आपल्या देवी देवतांपासून चालत आला आहे. महिषासूर मर्दिनी,काली माता,चंडिका अशा अनेक देवता ज्यांनी आपल्या शक्तीने आणि पराक्रमाने अनेक राक्षसांचा नाश केला.

इतिहासात डोकावले तर राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर,राणी ताराबाई,राणी चेन्नम्मा अशा कितीतरी स्रियांची नावं समोर येतील. या झाल्या युध्दभूमीवर पराक्रम गाजवणार्‍या स्रिया. पण बौध्दिक क्षेत्रातही स्रिया मागे नाहीत. पुराणातील गार्गी, मैत्रेयी,लोपामुद्रा इत्यादींनी आपल्या बुध्दीचातुर्याने मोठ्या मोठ्या विद्वान पंडितांना हरवले होते. विद्वत्तेच्या बाबतीत डाॅ. आनंदीबाई जोशी,डाॅ. रखमाबाई राऊत,पंडिता रमाबाई,सावित्रीबाई फुले इ. स्रियांनी आपली विद्वत्ता अशा काळात सिध्द केली की, ज्या काळात स्रियांना घराबाहेर पडण्याची देखील बंदी होती.

या स्रियांचा सन्मान करण्यासाठी आणि नवीन पिढीतील महिलांना प्रेरणा देण्यासाठी,पराक्रमी राणी गाईदन्ल्यूंचा २६ जानेवारी हा जन्मदिवस ‘नारी शक्ती दिवस ‘ म्हणून साजरा करण्यात येतो. 💐🙏

©  सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फ्यूज उडालेले बल्ब… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

फ्यूज उडालेले बल्ब... 💡 – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

फ्यूज उडालेले सगळे बल्ब एकसारखेच असतात !!

एक वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त झाल्यावर महाला सारखे सरकारी घर सोडून एका हाउसिंग सोसायटीत, त्यांच्या स्वत:च्या फ्लॅट मध्ये राहायला गेले.

ते सेवा निवृत्त असले तरी, स्वतःला एक मोठा अधिकारी समजत असतं आणि कधीही कोणाशी जास्त बोलत नसतं.

ते दररोज संध्याकाळी सोसायटीच्या पार्क मध्ये फिरत असतानासुद्धा, दुसऱ्यांची उपेक्षा करत आणि तिरस्कृत नजरेने पाहात असत.

एके दिवशी त्यांच्या शेजारी बसलेल्या एका ज्येष्ठ गृहस्थाने त्यांच्याशी संभाषण सुरू केले आणि हळूहळू या गप्पा-गोष्टी पुढेही चालू राहिल्या. आता ते दोघे रोज संध्याकाळी भेटत आणि खूप गप्पा मारत.

प्रत्येक वेळी त्यांचे बोलणे बहुत करून एकतर्फी असे, कारण ते निवृत्त होऊन आलेले अधिकारी एक सारखे फक्त स्वतःबद्दलच बोलत असत.

ते कधीही बोलायला लागले की म्हणायचे, “सेवा निवृत्त व्हायच्या आधी मी इतक्या पदावर कार्यरत होतो, की तुमच्यापैकी कोणीही त्या पदाची कल्पनासुद्धा करू शकणार नाही, केवळ नाइलाज आहे म्हणून मी येथे आलो आहे. ” आणि ते गृहस्थ अशाच अनेक गप्पा करत असत आणि ते दुसरे वयस्कर गृहस्थ शांतपणे त्यांचे सगळे बोलणे ऐकून घेत असत.

बरेच दिवसांनंतर एके दिवशी त्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने इतर ज्येष्ठ नागरिकांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दाखविली, तेव्हा मग त्या गृहस्थाने इतर प्रत्येक व्यक्तीची माहिती देण्यास सुरुवात केली.

ते म्हणाले,“सेवा निवृत्त झाल्यावर, आपण सगळे फ्यूज वुडलेल्या बल्बसारखे असतो. याने काही फरक पडत नाही की त्या बल्बची वॉट क्षमता किती होती, फ्यूज व्हायच्या आधी त्याने किती प्रकाश अथवा उजेड दिला. “

पुढे ते म्हणाले……

” मागील 5 वर्षांपासून मी ह्या सोसायटीत रहात आहे, परंतु आजपर्यंत कोणालाही हे सांगितले नाही की मी दोन वेळा सांसद म्हणून राहिलो होतो.

.. तुमच्या उजवीकडे वर्माजी आहेत, जे भारतीय रेल्वेत महाप्रबन्धक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत….. तिकडे सिंग साहेब आहेत, जे सेनेत मेजर जनरल होते.

.. तिकडे बाकावर पांढऱ्या शुभ्र पोशाखात बसलेले ते गृहस्थ मेहराजी आहेत, जे इस्रो (ISRO) च्या प्रमुख पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.

 — – आजपर्यंत त्यांनी ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही, मलासुद्धा, पण मला माहीत आहे.

सगळे फ्यूज उडालेले बल्ब आता एक समानच आहेत – त्यांची वॉट क्षमता काहीही असो – 0, 10, 40, 60, 100 वॉट – आता त्याने काहीही फरक पडत नाही.

.. आणि यामुळे सुद्धा काही फरक पडत नाही की फ्यूज उडायच्या आधी तो कोणत्या प्रकारचा बल्ब होता – एलईडी, सीएफएल, हॅलोजन, फ्लोरोसेंट, किंवा सजावटीचा.

.. आणि माझ्या मित्रा, हीच गोष्ट तुलासुद्धा लागू होते. ज्या दिवशी तुला ही गोष्ट समजेल, त्यादिवशी तुला या सोसायटीतसुद्धा शांती आणि समाधान लाभेल… उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोन्ही अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसतात. परंतु, खरे पाहता उगवत्या सूर्याला जास्त महत्त्व दिले जाते. इतके की त्याची पूजा सुद्धा केली जाते. पण मावळत्या सूर्याला तितके जास्त महत्त्व दिले जात नाही.

….. ही गोष्ट जितक्या लवकर समजेल तितके चांगले आहे. “

आपलं वर्तमान पद, नाव आणि रुबाब हे स्थायी नसतात.

या गोष्टींबद्दल जास्त जिव्हाळा व आसक्ती ठेवली असता, आपले जीवन अधिकच गुंतागुंतीचे होते कारण एके दिवशी आपण ह्या सर्व गोष्टींना मुकणार असतो.

लक्षात ठेवा की जेव्हा खेळ संपतो, तेव्हा राजा आणि प्यादे एकाच डब्यात बंदिस्त होतात.

आपल्या जवळ जे काही आहे त्याचा आनंद घ्या आणि भविष्यात उत्तम जीवन जगा. हवा तर समाज कार्यास वेळ द्या !

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गीता जशी समजली तशी… – गीता आणि समत्व – भाग – ५ ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

☆ गीता जशी समजली तशी… – गीता आणि समत्व – भाग – ५ ☆ सौ शालिनी जोशी

आपले जीवन विरोधी गोष्टींनी युक्त आहे. इथे सुख आहे आणि दुःखही आहे. तसेच राग- द्वेष, लाभ-अलाभ, जय- पराजय, शीत- उष्ण असे द्वैत आहे. यापैकी एक गोष्टच एका वेळी साध्य असते. आपली स्वाभाविक ओढ सुखाकडे. ते हातात आल्यावर निसटून जाईल की काय भीती आणि सुख मिळवण्यासाठी केलेले श्रम दुःखच निर्माण करतात. सुखाचे दुःख कसे होते कळतच नाही. जयाच्या उन्मादात पराजय पुढे ठाकतो. साध्याच्या वाटेवर अडचणी येतात, सध्याचे असाध्य होते. असा हा लपाछपीचा खेळ म्हणजे जीवन. माणूस यातच गुंततो आणि खऱ्या शाश्वत सुखाला मुकतो. अशा वेळी या दोन्ही गोष्टी कशा सांभाळाव्या आणि आनंदी जीवन कसे जगावे याचा उपाय गीता सांगते. तो म्हणजे समत्व,समानता.

सुख म्हणजे इंद्रियांना अनुकूल आणि इंद्रियांना प्रतिकुल ते दुःख. (ख- इंद्रिय). या दोन्हीचा परिणाम मनावर होऊ द्यायचा नाही. मन स्थिर असेल तर बुद्धी ही स्थिर राहते. कार्याविषयी दृढभाव निर्माण होतो. इंद्रियांच्या प्रतिक्रिया नाहीत. हळहळ नाही, हुरळून जाणे नाही. सुखदुःख येवो, यश मिळो अथवा न मिळो अशा विरुद्ध परिस्थितीतही मनाची चलबिचल न होता स्थिर राहणे हेच गीतेत सांगितलेले समत्व. गीता म्हणते,’ सिद्ध्यसिद्ध्यो: समो भूत्वा समत्वं योग उच्यतेl’ म्हणजेच ‘सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जयाजयौl’ अशी ही स्थिती. शीत- उष्ण, शुभ -अशुभ, राग- द्वेष, प्रिय-अप्रिय, निंदा-स्तुती, मान- अपमान असे प्रसंग येतच असतात. कोणतीही वेळ आली तरी जो सुखाने हर्षित होत नाही. दुःखाने खचून जात नाही त्यालाच समत्व साधले. अशा बुद्धीने केलेले कर्म हे निष्काम होते. कर्मातील मनाचा असा समतोलपणा हाच निष्काम कर्मयोग आणि हे ज्याला साधलं तोच श्रेष्ठ भक्त, गुणातीत, जीवनमुक्त.

हेच समत्व वस्तू व प्राणीमात्रांविषयी, सर्व भूतान् विषयी असावे असे गीता सांगते. वस्तू विषयी म्हणजे ‘समलोष्ठाश्मकांचन:’ (६/८)अशी स्थिती. दगड,माती आणि सोन या तीनही विषयी समत्व. माणसाला सोन्याची आसक्ती असते. ती नसणे म्हणजे ‘धनवित्त आम्हा मृत्तिके समान’. असा माणूस अनासक्त असतो. तसेच व्यक्तीविषयी समत्व ही गीता सांगते ‘सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबंधुषु l साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यतेl(६/९). निरपेक्ष मित्र,उदासीन, मध्यस्थ, द्वेष करणारा, हितकारक बंधू, पापी आणि साधू पुरुष यांचे विषयी समभाव असणारा ब्राह्मण, गाय, कुत्रा, चांडाळ यातही समत्व पाहतो. कुणाच्या द्वेष करत नाही. वरवर ते भिन्न दिसले तरी सर्वांमध्ये एकच परमेश्वर आहे या भावनेने सर्वांचा योग्य आदर करणे हीच समत्वबुद्धी. भगवंत स्वतःही समत्त्वाचे आचरण करतात. ‘समोsहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योsस्ति न प्रिय:l’ ‘सर्व भूतात मी समभावाने व्यापून आहे. मला कोणी अप्रिय नाही आणि प्रिय नाही. हा भेद माझ्या ठिकाणी नाही. आत्मरूपाने मी सर्वांना व्यापून आहे.

सर्व भूतात भगवंत तोच माझ्यात आहे आणि मी त्यांच्यात हा सर्व भुतात्मभाव. ‘ जे जे देखे भूत ते ते भगवंत’ मान्य झाली की राग द्वेष कुणाच्या करणार ? सर्वत्र एकच परमात्मा पाहणे हेच समत्व. असे समत्व प्राप्त झाले की दृष्टिच बदलते. गत काळाचा शोक नाही, भविष्याची चिंता नाही. वर्तमानात सर्वांशी समत्वाने व्यवहार. प्राप्त कर्म उत्कृष्टपणे करणे हाच स्वधर्म होतो. शत्रु- मित्र आणि लाभ-अलाभ इत्यादी सर्व भेद स्वार्थापोटी. पण जेथे स्वार्थच नाही तिथे सर्वच समत्व. दोषांची निंदा नाही, गुणांचे स्तुती नाही दोन्ही सारखेच. आपपर भाव नाही. अशीही भेद रहित अवस्था म्हणजे सर्व सुख, मोक्ष.

असा हा जीवनाला आवश्यक विचार गीता सांगते. त्रासदायक गोष्टी टाळून शांत व सुखी जीवनाचा मार्ग दाखवते. अध्यात्माची दृष्टी देते. अर्जुनालाही युद्धातील जय पराजया विषयी समत्व सांगितले. युद्धात समोर येणारा कोणीही असला तरी शत्रूच असतो. ही समत्वबुद्धी सांगून अशा समत्व योगाने कर्म हेच कौशल्य असेही सांगितले. असे निष्काम बुद्धीने केलेल्या कर्माचे अकर्म होते. ते पाप पुण्य द्यायला शिल्लक राहत नाही. अशा प्रकारे अर्जुनाबरोबर सर्वांनाच गीता नवीन विचार देते. सत्कर्म, स्वधर्म, समत्व हा गीतेचा पायाच आहे.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तुझे आहे तुजपाशी – –” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “तुझे आहे तुजपाशी – –” ☆ श्री जगदीश काबरे

मोगो नावाचा एक चिनी मुलगा. तो बिचारा दगड फोडायचं काम करायचा. हाताला फोड यायचे. उन्हातान्हात दगड फोडून अंगाला घामाच्या धारा लागायच्या. लोकांना कसली भन्नाट कामं करायला मिळतात आणि आपल्याच नशिबी काय ही दगडफोडी, असं तो नेहमी मनात म्हणे आणि दुःखी होई.

एकदा त्याचं दुखणं एका देवदुतानं ऐकलं. त्याचे दयावून त्याने त्याला विचारलं की, “का तू इतका उदास?”

मोगो म्हणतो, “देवानं माझ्यावर अन्याय केलाय. हे असलं काम दिलंय मला. तू विचार देवाला की, का त्यानं असं केलं?” 

देवदूत देवाकडं जातो विचारतो, “का या तरुणावर अन्यायकेला तुम्ही?” 

देव म्हणतो, “ठीक आहे. आजपासून त्याला जे काम आवडेल ते त्याला मिळेल. “

त्याच दिवशी मोगो दगड फोडताना एक श्रीमंत माणूस पाहतो. तो असतो हिर्‍यांचा व्यापारी. मोगोला वाटतं, ‘असं नशीब पाहिजे होतं आपलं. ‘ 

देवदूत तथास्तू म्हणतो आणि मोगो एकदम बडा व्यापारी होतो. एका महालात हिरे-जवाहरात लोळू लागतो. पण नेमका त्या वर्षी उन्हाळा फार असतो. काही दिवसात तो कंटाळतो. त्याला वाटतं, ‘या पैशाला काही अर्थ नाही. आपण थेट सूर्याइतकं पॉवरफूल व्हायला हवं. ‘

त्याच क्षणी त्याचं सूर्यात रूपांतर होतं… सर्वोच्च स्थान! सारं जग त्याच्याभोवती फिरू लागतं. उन्हाळा सरून पावसाळा येतो. ढग सूर्याला ग्रासून टाकतात. मोगोला तर पृथ्वीही दिसेनाशी होते. त्याला वाटतं, ‘सूर्यापेक्षा ढग जास्त पॉवरफूल आहे. ‘ 

मग काय तो ढग होतो… बरसतो. पण पाहतो तर काय, सगळं जग भिजतंय पण एक टणक खडक मात्र कोरडाच. पाण्यानं तो न फुटतो न हलतो. मोगो म्हणतो, ही खरी ताकद. त्याक्षणी तो खडक होतो.

काही दिवसांत एक माणूस येतो खडक फोडायला लागतो. मोगो पुन्हा ओरडतो आणि म्हणतो, ‘देवा मला खडक फोडणारा कर, तो खरा स्ट्राँग!’ 

झालं, मोगो पुन्हा दगडफोड्या होतो.

मग मोगो देवदुताला विचारतो, “म्हणजे मीच खरा पॉवरफूल आहे की काय?”

देवदूत हसतो आणि म्हणतो, “तुला मनापासून तुझं काम आवडलं, त्यात सुख वाटलं तर तूच खरा पॉवरफूल. नाहीतर तू कुणीही झालास तरी असमाधानीच राहशील. “

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चल अकेला… चल अकेला… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ चल अकेला… चल अकेला… ☆ श्री सुनील शिरवाडकर

ओ. पी. नय्यर

“मी कंपोजर म्हणून जन्माला आलो.. कंपोजर म्हणुनच देह ठेवणार”

हे उद्गार आहेत ओ. पी. नय्यरचे. ओपीचा जन्म लाहोरचा. जगण्याची ऐट बघावी तर लाहोरमध्ये असा तो काळ. मदन गोपाल नय्यर या सरकारी हुद्देदाराच्या पोटी जन्माला आलेला हा मुलगा संगीत क्षेत्रात नाव काढील असं खरं तर कोणालाही वाटलं नसेल. लाहोरच्याच शाळेत तो शिकला. माध्यम उर्दू. अभ्यासात त्याचं लक्ष कधीच नव्हतं. छंद गाणी म्हणण्याचा.

असंच एकदा लाहोर रेडिओ वर गाणं म्हणण्याची त्याला संधी मिळाली. तेव्हा त्याचं वय होतं अवघं आठ.

… आणि मग त्याला रेडिओवर कामं मिळतंच गेली. कधी लहान मुलांच्या कार्यक्रमात तर कधी कोरसमध्ये. त्याकाळी लाहोर फिल्म इंडस्ट्री जोरात होती. त्याला एक दोन चित्रपटात कामेही मिळाली. घरच्यांचा अर्थातच विरोध. पोरगं वाया गेलं.. गाणं बजावण्याच्या मागे लागलं ही भुमिका.

तो मॅट्रीक झाला. जेमतेमच मार्क मिळाले. लाहोरमधल्या यथातथा कॉलेजमध्ये एडमीशन मिळाली. आता त्याला वेड लागले इंग्रजी चित्रपट बघण्याचे. त्यातील पात्रांचे रहाणीमान,स्टाईलच्या तो प्रेमात पडला. त्यानेही आपली स्टाईल बदलली. सिल्कचा फुल स्लीव्ह शर्ट, ट्राऊजर,पायात चकचकीत शुज,आणि डोक्यावर हैट.

देशाची फाळणी झाली आणि सगळंच बदलुन गेलं. तो मुंबईत आला. काही चित्रपट मिळत गेले. पण हवं तसं यश काही मिळत नव्हतं. पण ‘आरपार’ आला आणि ओपीचं नशीब बदललं. एकामागोमाग एक हिटस्. फिल्म इंडस्ट्रीने अक्षरशः त्याला डोक्यावर घेतलं. यश.. पैसा.. किर्ती कशालाच कमी नाही. मोती माणकांचा पाऊस पडत होता. ओपी म्हणतो..

माझ्या पुरुषार्थावर नियती भाळली. तिच्या जुगारी, लहरी स्वभावावर मी फिदा. आमचं हे ‘लव अफेअर’ दहा वर्ष टिकलं. ही दहा वर्ष मी अक्षरशः सोन्याचे मढवुन काढली. यश.. पैसा.. किर्ती.. सुंदर, बुध्दिमान ललनांचा सहवास.. सगळं सगळं उपभोगलं. यथेच्छ.

आणि मग त्याच्या लक्षात येत गेलं. मोठे निर्माते आपल्याला टाळताहेत. काही बी ग्रेड.. सी ग्रेड चित्रपट मिळाले. त्यातही एखाद दुसरं गाणं हिट जायचं.

ओपीने काळाची पावलं ओळखली. काही प्रॉपर्टीज विकल्या. शेअर्स मध्ये पैसे अडकवले. मरीन ड्राईव्ह वरचा प्रशस्त फ्लॅट ठेवला. देवाला विनवले..

शेवटपर्यंत माझी ऐट सांभाळ.

आणि मग तो फिल्म इंडस्ट्रीपासुन अलगदपणे दुर झाला. नवीन आयुष्य सुरु झाले. सकाळी जरावेळ हार्मोनियम घेऊन बसायचे. त्यानंतर देवाचा जप. एका वहीत तो ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे’ असं लिहीत. पण उर्दूत. ओपीला देवनागरी लिपी लिहीता वाचता येत नव्हती. कारण शिक्षण झालेलं उर्दू माध्यमात.

संध्याकाळ तो पेशंट तपासे. हो तो आता किंचितसा डॉक्टर झाला होता. झालं काय कि.. एकदा त्याला कसलासा त्रास होत होता. आशा भोसले आणि सुधीर फडके त्याला घेऊन गेले डॉ. फाटकांकडे. डॉ. फाटक होमिओपॅथीत निष्णात. त्यांच्या औषधाने ओपींना आराम वाटला. ओपीने डॉक्टरांचे शिष्यत्व पत्करले. होमिओपॅथीची ओळख झाली. आणि मग संध्याकाळी दोन तीन पेशंटस् तपासु लागले. पण मोफत.

फी साठी नाही.

कधी रात्री जेवण झाल्यावर मरीन ड्राईव्ह वर जाऊन बसावे.. तर कधी इंग्रजी चित्रपटाला. रिगल.. लिबर्टी.. इरॉस ही आवडती थिएटर्स. जायचं ते थाटात. एकदम चार पाच तिकिटं खरेदी करायची. आजुबाजुच्या खुर्च्या रिकाम्या. त्यावर कोट.. हॅट ठेवायची. पाय लांब करायचे.. आणि चित्रपट एंजॉय करायचा.

१६ जानेवारी म्हणजे ओपीचा जन्मदिवस. आदल्या दिवशी भरपूर मिठाया.. ड्राय फ्रुटस् आणुन ठेवायचा. दिवसभर चाहत्यांची गर्दी. पहिला बुके येणार एच. एम. व्ही. कडुन.

संध्याकाळी गाण्यांची मैफल जमायची कोणी कोणी येत.. ओपीची गाणी म्हणत. कधी सुरात.. कधीच बेसुरातही. पण ओपीला ते आवडे.

असेच एकदा एका नवोदित गायकाने गाणं म्हणायला सुरुवात केली.

‘चल अकेला.. चल अकेला.. ‘

आणि ओपीला तो दिवस आठवला……

एस. मुखर्जी ‘संबंध’ बनवत होते. गाणी होती कवी प्रदिप यांची. संगीत ओपी. त्यादिवशी प्रदिप यांनी गाणं लिहुन आणलं. हेच ‘चल अकेला.. चल अकेला.. ‘ आणि मुखर्जींकडे हट्ट धरुन बसले. याला चाल मीच लावणार.. गाणारही मीच.

ओपीने ते गाणं वाचलं. आणि त्यांच्या लक्षात आलं. प्रदिप या चांगल्या गाण्याचा विचका करणार. ते चिडले. आणि घरी निघून आले. ते गाणं डोक्यात घोळत होतंच. शब्द कसदार होते. अर्थ प्रवाही होता. पियानोवर बसले आणि एक अफलातुन चाल त्यांच्याकडून तयार झाली.

थोड्या वेळाने त्यांच्या मागोमाग प्रदिप आणि मुखर्जी ओपींकडे आले. त्यांची समजूत घालायला. आल्यानंतर प्रदिप यांनी ते गाणं.. ती चाल ऐकली आणि म्हणाले..

“ओपी तुम्ही माझ्या गाण्याचं लखलखतं झुंबर करुन टाकलंय”

ओपीने नंतर ते गाणं रेकॉर्ड केलं. मुकेशच्या आवाजात. वास्तविक मुकेश ओपीकडे फारसा गायला नाही. पण या गाण्यासाठी मुकेशच हवा हा आशा भोसलेचा हट्ट.

“या गाण्याचं मुकेश सोनं करील” 

हा आशाचा अंदाज सहीसही खरा ठरला.

————————————-

या गीतातील शब्द खरे ठरतील.. तेही आपल्या आयुष्यात हे ओपीला ठाऊकच नव्हते. निवृत्तीनंतरचं सुखासीन आयुष्य सुरु होतं. पण नशीब पालटलं. कौटुंबिक वाद सुरु झाले. प्रत्यक्ष बायको, मुलांनीच इस्टेटीवरुन त्याच्यावर दावा ठोकला. आणि ओपी कोसळला.

कोणताही विरोध न करता त्याने आपला फ्लॅट सोडला. अंगावरच्या कपड्यानिशी ओपी बाहेर पडला. सोबत घेतला फक्त हार्मोनियम.. जो त्याने लाहोरला पहिल्या कमाईतून घेतला होता. आणि घेतल्या नोटेशन्सच्या वह्या.

सगळं सोडुन दुर विरारला एका साध्या तीन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये रहायला आला. दुर तिकडे लाहोरला पर्वत पहाडांच्या मुलखात जन्माला आलेला.. मुंबईत सागर किनारी स्थिरावलेला.. यश,किर्ती सगळं काही मिळवलेला ओंकार प्रसाद नय्यर. शेकडो गाणी ज्याने आपल्या सुरांनी मढवली.. त्याच्या आयुष्याची आता संध्याकाळ झाली होती. अगदी 

‘लागले नेत्र रे पैलतीरी’

ही अवस्था. वारंवार जुने दिवस आठवताना त्याच्या लक्षात आले..

मागे नसतं पहायचं आठवणीत शिरताना..

पावलं जड पडतात

तिथुन मागे फिरताना.

आणि मग साऱ्या जुन्या आठवणींना त्याने मागे सारले. आपला जुना.. लाडका हार्मोनियम पुढे ओढला. आणि तेच गीत पुन्हा पुन्हा आळवु लागला…

‘चल अकेला चल अकेला चल अकेला…

तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला.. ‘

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मला जरा आराम हवा आहे…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “मला जरा आराम हवा आहे” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

“आई मला जरा आराम हवा आहे.. “

शाळेत जाणारी मुलगी अभ्यास, शाळा, क्लास करून थकून आईला म्हणाली.

“अगं चांगला अभ्यास कर, नंतर आरामच करायचा आहे.. “

मुलगी उठली, अभ्यासाला लागली आणि आराम करायचा राहून गेला.

“आई थोडा वेळ दे आरामाला, ऑफिस च्या कामातून थकून गेलीये मी पार.. “

अगं लग्न करून सेटल हो एकदाची, मग आरामच करायचा आहे..

मुलगी लग्नासाठी तयार झाली आणि आराम करायचा राहून गेला.

“अहो इतकी काय घाई आहे, एखादा वर्ष थांबू ना जरा.. “

“अगं मुलं होऊन गेली वेळेवर की टेन्शन नाही, नंतर आरामच करायचा आहे… “

मुलगी आई बनली आणि आराम करायचा राहून गेला..

“अगं तुलाच जागरण करावं लागेल, मला ऑफिस आहे उद्या.. थोडे दिवस फक्त, मुलं मोठी झाली की आरामच करायचा आहे.. “

ती बाळासाठी रात्रभर जागी राहिली आणि आराम करायचा राहून गेला.

“अहो मुलं आता शाळेत जायला लागली, जरा निवांत बसू द्या की मला.. “

“मुलांकडे नीट लक्ष दे, त्यांचा अभ्यास घे, नंतर आरामच करायचा आहे… “

ती मुलांचा प्रोजेक्ट करायला बसली आणि आराम करायचा राहून गेला..

“आता मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिली, आता जरा निवांत झाले मी.. “

“आता यांच्या लग्नाचं पाहावं लागेल, ती एक जबाबदारी पार पाडली की मग आरामच करायचा आहे.. “

तिने कंबर कसून सगळा कार्यक्रम आटोपला आणि आराम करायचा राहून गेला..

“मुलं संसाराला लागली, आता मी आराम करणार.. “

“अगं आपली सुधा गर्भार आहे, माहेरी बाळंतपण करायचंय ना तिचं.. “

मुलीचं बाळंतपण आवरलं आणि आराम करायचा राहून गेला..

“चला, ही पण जबाबदारी पार पडली, आता आराम. “

“सासूबाई मला नोकरी परत जॉईन करायची आहे.. आरव ला सांभाळाल का?”

नातवाच्या मागे दमली आणि आराम करायचा राहून गेला..

“चला नातू मोठा झाला, आता सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या.. आता मी आराम करणार.. “

“अगं ऐकलं का, गुडघे दुखताय माझे, उठवलं जात नाही.. Bp वाढलाय वाटतं, डायबिटीस पण आहे.. डॉकटर ने वेळेवर पथ्यपाणी करायला सांगितलंय बरं का.. “

नवऱ्याची सेवा करायला उरलं सुरलं आयुष्य गेलं.. आणि आराम करायचा राहूनच गेला..

एक दिवशी देवच आला खाली, आराम करायचाय ना तुला? तिने हात जोडले आणि देव घेऊन गेला.. अखेर तिला आराम मिळाला, अगदी दिर्घकाळाचा.. !!!

सर्व स्त्रियांना समर्पित
👌💐 👍💐👌

लेखक  : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares