मराठी साहित्य – विविधा ☆ बीज… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ बीज… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆

बीज हा शब्द माहित नसेल असा मनुष्य शोधून सुद्धा सापडणार नाही.सर्वसाधारणपणे कोणत्याही वनस्पतीच्या बी ला *बीज* असे म्हटले जाते. इंग्रजी माध्यमात शिकलेली मुलं फार तर Seed अस म्हणतील, पण त्यामागील मर्म मात्र सर्वांना ठाऊक आहे.

आपला देश कृषिप्रधान आहे. पूर्वी *”उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी”* असे सूत्र समाजात प्रचलित होते. स्वाभाविकच शेती करणाऱ्याला समाजात खूप मोठा आणि खराखुरा मान होता. दुष्काळ काय सध्याच पडायला लागले असे नाही, ते याआधीही कमी अधिक प्रमाणात होतेच. त्याकाळात शेतकरी जरी पारंपारिक पद्धतीने शेती केली जात होती. शेतकरी आपल्या बियाण्याची पुरेशी काळजी घेत असत. शेती नैसर्गिक पद्धतीने केली जायची, श्रद्धेनी केली जायची. रासायनिक शेती नव्हतीच. आपली शेती तेव्हा पूर्णपणे गोवंशावर आधारित होती. त्यामुळे तेव्हा जे काही कमी अधिक अन्नधान्य  शेतकऱ्याला मिळायचं ते *’सकस’*असायचे, ते पचविण्यासाठी आणिक हाजमोला खाण्याची गरज पडत नव्हती. एका अर्थाने मागील पिढ्या धष्ठपुष्ट होत्या. शिवकाळातील कोणत्याही सरदाराचा पुतळा किंवा छायाचित्र बघितले तर ते आपल्या सहज लक्षात येईल.

कोणत्याही कर्माचे फळ हे त्या कर्माच्या हेतूवर अवलंबून असते. शरीरावर शस्त्रक्रिया करणारा तज्ञ मनुष्याचे पोट फाडतो, आणि एखादा खुनी मनुष्यही पोट फाडतो. दुर्दैवाने शस्त्रक्रिया करताना रुग्णास मृत्यू आला तर त्या तज्ञास शिक्षा होत नाही, पण खून करणाऱ्यास शिक्षा होण्याची शक्यता जास्त असते. पूर्वीच्या काळी बलुतेदार पद्धती असल्यामुळे शेतकरी धान्य फक्त स्वतःसाठी, अधिकाधिक फायद्यासाठी न पिकवता संपूर्ण गावासाठी पिकवायचा आणि तेही देवाचे स्मरण राखून. आपली समाज रचना धर्माधिष्ठित होती. इथे ‘धर्म’ हा धर्म आहे, आजचा ‘धर्म’ (religion) नाही. धर्म म्हणजे विहीत कर्तव्य. समाजातील प्रत्येक घटक आपापले काम ‘विहीत कर्तव्य’ म्हणून
करायचा. त्यामुळे त्याकाळी प्रत्येक काम चांगले व्हायचे कारण एका अर्थाने तिथे भगवंताचे अधिष्ठान असायचे.

मधल्या  काळात पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेले. देश स्वतंत्र झाला. विकासाची नविन परिमाणे अस्तित्वात आली आणि ती कायमची समाजमनात ठसली किंवा जाणीवपूर्वक ठसवली गेली. जूनं ते जुनं (टाकाऊ) आणि नवीन तितके चांगले असा समज समाजात जाणीवपूर्वक दृढ करण्यात आला. भारतीय विचार तेवढा मागासलेला आणि पाश्चिमात्य विचार मात्र पुरोगामी (प्रागतिक) असा विश्वास समाजात जागविला गेला. विकासाचा पाश्चात्य विचार स्वीकारल्याचे दुष्परिणाम आज आपण सर्वजण कमीअधिक प्रमाणात अनुभवत आहोत. अधिकाधिक धान्य उत्पादन करण्याच्या नादात रासायनिक खतांचा बेसुमार वापर करून आणि गोकेंद्रित शेती न करता आपण इंधन तेलावर आधारित परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्च करणारी ‘श्रीमंत’ शेती करू लागलो आणि वसुंधरेचे नुसते आपण नुसते दोहन केले नाही तर तिला ओरबाडून खायला सुरुवात केली. त्यामुळे पुढील पिढीला जागतिक तापमान वाढ, वातावरणातील बदल, आर्थिक विषमता आणि भूगर्भातील पाण्याचा तुटवडा अशा कितीतरी भयानक गोष्टी भेट म्हणून जन्मताच वारसाहक्काने दिल्या असे म्हटले तर वावगे होऊ नये. ह्यातून आज तरी कोणाची सुटका नाही.

ह्या सर्व गोंधळात आपण *बीज* टिकविण्याचे  सोयीस्कररित्या विसरलो. जिथे *बीजच* खराब तिथे पीक चांगले येईल अशी अपेक्षा करणे हा मूर्खपणाच ठरणार, नाही का? *”शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी ।।”* असे संतांनी सांगितले असताना आपण ते ‘संतांनी’ सांगितले आहे म्हणून दुर्लक्ष केले आणि हीच आपली घोडचूक झाली असे म्हणता येईल. आपल्या सर्वांच्या एक गोष्ट लक्षात आली असेलच. *खराब* झालेले बीज फक्त शेतातील बियाण्याचे नाही तर आज प्रत्येक क्षेत्रात आपल्याला त्याची प्रचिती येते.
समाजातील सज्जनशक्तीबद्दल पूर्ण आदर व्यक्त करून असे म्हणावेसे वाटते की खूप शिक्षक पुष्कळ आहेत पण चांगला शिक्षक शोधावा लागतो, शाळा भरपूर आहेत पण चांगली शाळा शोधावी लागते, डॉक्टर भरपूर आहेत पण चांगला डॉक्टर शोधावा लागतोय, वकील पुष्कळ आहेत पण चांगला वकील शोधावा लागतोय, अभियंते भरपूर आहेत पण चांगला अभियंता शोधावा लागतोय. आज ही परिस्थिती समाजपुरुषाच्या प्रत्येक घटकास कमीअधिक प्रमाणात लागू आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते. हे चित्र बदलण्याचे कार्य आज आपणा सर्वांना करायचे आहे. कारण संकट अगदी आपल्या घरापर्यंत येऊन पोहचले आहे. हे सर्व ऐकायला, पहायला, स्वीकारायला कटू आहे पण सत्य आहे. आपण आपल्या घरात कोणते बीज जपून ठेवत आहोत किंवा घरात असलेले ‘बीज’ खरेचं सात्विक आहे की त्यावरील फक्त वेष्टन (टरफल) सात्विक आहे याचीही काळजी घेण्याची सध्या गरज आहे. वरवर दिसणारे साधे पाश्चात्य शिष्ठाचार आपल्या संस्कृतीचा बेमालूमपणे ऱ्हास करीत आहेत. *शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा आणि आपल्या घरात शिवाजीचा मावळा सुद्धा जन्मास येऊ नये असे जोपर्यंत आईला वाटेल तो पर्यंत यात काहीही फरक पडणार नाही.*

संत ज्ञानेश्वरांच्या काळात देखील असेच अस्मानी आणि सुलतानी संकट होते. राष्ट्राचा विचार करताना दोनचारशे वर्षांचा काळ हा फार छोटा कालखंड ठरतो. माऊलींपासून सुरु झालेली भागवत धर्माची पर्यायाने समाज प्रबोधनाची चळवळ थेट संत तुकारामांपर्यंत चालू राहिली. ह्या सर्व पिढ्यानी सात्विकता आणि शक्तीचे बीज टिकवून ठेवले त्यामुळे त्यातूनच शिवाजी राजांसारखा हिंदू सिंहासन निर्माण करणारा स्वयंभू छत्रपती निर्माण झाला. *”बहुता सुकृताची जोडी । म्हणोनि विठ्ठलीं आवडी।।”* म्हणणारे तुकोबाराय सुद्धा हेच सूत्र (शुद्ध बीज टिकविले पाहिजे) वेगळ्या भाषेत समजावून सांगत आहेत. समर्थांच्या कुळातील मागील कित्येक पिढ्या रामाची उपासना करीत होत्या, म्हणून त्या पावनकुळात समर्थ जन्मास आले. कष्टाशिवाय फळ नाही, नुसते कष्ट नाही तर अखंड साधना, अविचल निष्ठा, तितिक्षा, संयम, धैर्य अशा विविध गुणांचा संचय करावा लागतो तेव्हा कुठे ‘ज्ञानेश्वर’, ‘तुकाराम’, ‘छत्रपती शिवाजी’, ‘सावरकर’, ‘भगतसिंग’, डॉ. हेडगेवार जन्मास येत असतात.

*मृग नक्षत्र लागले की आपल्याकडे पाऊस सुद्धा कमी अधिक प्रमाणात सुरु होतो. शेतकऱ्यांची बियाणे पेरायची झुंबड उडते. शेतकरी आपले काम श्रद्धेनी आणि सेवावृत्तीने करीत असतात. आपणही त्यात आपला खारीचा वाटा घ्यायला हवा. आपल्याला देशभक्तीचे, माणुसकीचे, मांगल्याचे, पावित्र्याचे, राष्ट्रीय चारित्र्याचे, सांस्कृतिक स्वातंत्र्याचे, तसेच समाजसेवेचे बीज पेरायला हवे आहे आणि त्याची सुरुवात स्वतःपासून, आपल्या कुटुंबापासून करायची आहे.*

विकासाच्या सर्व कल्पना मनुष्यकेंद्रीत आहेत आणि ती असावयासच हवी. पण सध्या फक्त बाह्यप्रगती किंवा भौतिक प्रगतीचा विचार केला जात आहे. पण जोपर्यंत मनुष्याचा आत्मिक विकास होणार नाही तोपर्यंत भौतिक विकासाचा अपेक्षित परिणाम आपल्याला दिसणार नाहीत. मागील शतकात लॉर्ड मेकॉले नावाचा एक ब्रिटिश अधिकारी भारतात येऊन गेला. संपूर्ण भारतात तो फिरला. नंतर त्याने ब्रिटिश संसदेत आपला अहवाल सादर केला. त्यात तो स्वच्छपणे सांगतो की संपूर्ण भारतात मला एकही वेडा आणि भिकारी मनुष्य दिसला नाही. सर्व जनता सुखी आहे. आणि ह्याला एकच कारण आहे ते म्हणजे इथली विशिष्ठ कुटुंब रचना आणि कुटुंबातील जेष्ठांचा आदर करण्याची पद्धत (‘एकचालकानुवर्तीत्व’).
आज आपल्याकडे काय परिस्थिती आहे हे वेगळे सांगण्याची गरजच नाही, वृद्धाश्रमांच्या संख्येवरूनच ते आपल्या लक्षात येईल. हे एक उदाहरण झाले. अश्या बऱ्याच गोष्टीत आपण पाश्चात्य लोकांस मागे टाकले आहे.

एक छान वाक्य आहे. *”लहानपणी आपण मुलांना मंदिरात घेऊन गेलो तर तीच मुलं म्हातारपणी आपल्या तीर्थयात्रा घडवतात”*.
‘मुलं एखादवेळेस ऐकणार नाहीत पण अनुकरण मात्र नक्की करतील हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. मुलांनी अनुकरण करावे असे वातावरण आपण आपल्या नविन पिढीला देऊ शकलो तर हे खूप मोठे राष्ट्रीय कार्य होईल. त्यासाठी समाजात नवीन आदर्श प्रयत्नपूर्वक निर्माण करावे लागतील आणि असलेल्या आदर्शाना समाजासमोर प्रस्तुत करावे लागेल. आपल्या मुलांकडून माणुसकीची अपेक्षा करण्याआधी आपण त्यांना आपल्या आचरणातून माणुसकी शिकवावी लागेल. आपल्याकडे  विवाहसंस्कार सुप्रजा निर्माण करण्यासाठी आहे. तो फक्त *’सुख’* घेण्यासाठी नक्कीच नाही, पण याचा विचार विवाहप्रसंगी किती कुटुंबात केला जातो ?, मुख्य *’संस्कार’* सोडून बाकी सर्व गोष्टी दिमाखात पार पाडल्या जातात, पण विवाह संस्था आणि गृहस्थाश्रम म्हणजे काय हे कोणी सांगत नाही. ते शिकविणारी व्यवस्था आज नव्याने निर्माण करावी लागेल.

हिंदू संस्कृती पुरातन आहे. जशी आपली ‘गुणसूत्रे’ आपण आपल्या पुढील पिढीस सुपूर्द करीत असतो तसेच ‘नीतीसूत्रे’ही पुढील पिढीस देण्याची निकड आहे. अर्थात नितीसुत्रे देताना मात्र आचरणातून अर्थात *’आधी केले मग सांगितले’* या बोधवचनाचे स्मरण ठेऊन द्यावी लागतील आणि हा महान वारसा जपण्याची प्रेरणा सुद्धा. आपल्या पुढील पिढीला आपल्या वडिलांची कीर्ती सांगावीशी वाटेल असे आपण जगायचा प्रयत्न करायला हवा. पाऊस पडल्यावर सर्व वसुंधरेस चैतन्य प्राप्त होते, बहुप्रसवा असलेली वसुंधरा हिरवा शालू पांघरते, या सृजनातून सर्व प्राणीमात्रांना वर्षभर पुरेल इतके अन्नधान्य प्राप्त होत असते. या आल्हाददायी वातावरणाचा मानवी मनावरदेखील सुखद परिणाम होत असतो.

*या आल्हाददायी, मंगलमयी वातावरणामुळे आपल्या विचारांनासुद्धा नवसंजीवनी प्राप्त व्हावी आणि ‘सुसंस्कारांचे, सात्विकतेचे बीज संवर्धित आणि सुफलीत’ करण्याचे कार्य आपणा सर्वांकडून घडावे अशी श्रीरामचरणी प्रार्थना करतो.*

भारत माता कि जय।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

२२.०६.२०१८

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आंबामेव जयते… लेखक – श्री द्वारकानाथ संझगिरी ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

☆ आंबामेव जयते… लेखक – श्री द्वारकानाथ संझगिरी ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

अलीकडे ‘पहिला आंबा खाणं’ हा एक इव्हेण्ट झालाय. सुरुवातीला आंब्याचा भाव (अर्थात हापूस) हा डझनाला बाराशे रुपये असतो. मी इंजिनिअरिंग कॉलेजमधून बाहेर पडलो तेव्हा बाराशे रुपये पगार हा ‘वलयांकित’ पगार होता. ‘‘मला फोर फिगर पगार आहे,’ हे थाटात सांगितलं जायचं. आता त्या भावात बारा आंबे मिळतात.

दर मोसमात आंब्याचा भाव वाढतो आणि दर मोसमात त्याचं कारण दिलं जातं की, ‘यंदा फळ जास्त आलं नाही’. पुढेपुढे ‘किती आंबे खाल्ले’ ही इन्कम टॅक्सकडे जाहीर करण्याची गोष्ट ठरू शकते आणि आयकर विभागाच्या धाडीत दहा पेट्या आंबा सापडला ही बातमी ठरू शकते. पण तरीही आंबा हा मराठी माणसाच्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक कायम राहणार.

मी जिभेने सारस्वत असल्यामुळे सांगतो, मला बांगड्याएवढाच आंबा आवडतो. तुम्ही मला पेचात टाकणारा प्रश्न विचाराल की, ‘बांगडा की आंबा?’ तर उत्तर, दोन्ही,  आंबा आणि बांगड्याबद्दल असेल. तळलेला बांगडा आणि आमरस हे एकाच वेळी जेवणात असणं यालाच मी ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असं म्हणतो.

माझ्या लहानपणीसुद्धा हापूस आंबा महाग असावा. कारण तो खास पाहुणे आले की खाल्ला जायचा. आमरस करण्यासाठी पायरी आंबा वापरला जायचा आणि ऊठसूट खायला चोखायचे आंबे असत. बरं, पाहुण्याला हापूस देताना आंब्याचा बाठा खायला देणं अप्रशस्त मानलं जाई. त्यामुळे बाठा माझ्या वाट्याला येत असे. मला बाठा खायला किंवा चोखायला अजिबात लाज वाटली नाही आणि आजही वाटत नाही. दोन मध्यमवर्गीय संस्कार माझ्यात आजही अस्तित्वात आहेत. एक, आंब्याचा बाठा खाणे आणि दुसरा, दुधाचं भांडं रिकामं झाल्यावर जी मलई किंवा तत्सम गोष्ट भांड्याला चिकटते, ती खाणे. कसले भिकारडे संस्कार, असा घरचा अहेर (माहेरहून आलेला) मला मिळायचा! पण ज्यांनी तो आनंद घेतलाय त्यांनाच माझा आनंद कळू शकेल. एवढंच काय की, घरचं दूध नासलं की मला प्रचंड आनंद व्हायचा. त्यात साखर घालून आई ते आटवायची आणि त्यातून जे निर्माण व्हायचं त्यालाच ‘अमृत’ म्हणत असावेत, अशी लहानपणी माझी समजूत होती. आता हा आनंद दुष्ट वैद्यकीय विज्ञानामुळे धुळीला मिळालाय. देवाने माणसाला कोलेस्टेरॉल का द्यावं? आणि त्यात पुन्हा वाईट आणि चांगलं असे दोन प्रकार असताना वाईट कोलेस्टेरॉल का द्यावं? बरं ते कोलेस्टेरॉल जर निर्माण करायचं, तर ते मलईत वगैरे टाकण्यापेक्षा कारलं, गवार किंवा सुरणात टाकलं असतं तर बिघडलं असतं का? आंबाही फार नको, असं सुचविताना डॉक्टर त्यात पोटॅशियम असतं ते चांगलं, असा उःशाप देतो ते बरं असतं.

आंबा हा फळांचा खऱ्या अर्थाने राजा! तो मला जेवणाच्या ताटात किंवा बशीत कुठल्याही रूपात आवडतो. आमच्या घरी आंबा खास पाहुण्यांना (बायकोची आवडती माणसं) हा सालंबिलं कापून, छोटे तुकडे करून एका ‘बोल’मध्ये छोट्या फोर्कसह पेश केला जातो. असं साहेबी आंबा खाणं मला बिलकूल आवडत नाही. आंबा खाताना हात बरबटले पाहिजेत, सालंसुद्धा चोखलीच पाहिजेत आणि जमलं तर शर्टावर तो सांडला पाहिजे. तरच तो आंबा खाल्ल्यासारखा वाटतो. आंबा ताटात असताना मासे सोडून इतर पदार्थ मला नगण्य वाटतात. विव्ह रिचर्डस्‌ बॅटिंग करताना मैदानावरच्या इतर सर्व गोष्टी नगण्य वाटायच्या तशा! आंबा खाण्यासाठी चपाती, परोठ्यापासून सुकी भाकरही मला चालते.

फक्त एकच गोष्ट मला जमलेली नाही. आमरस भातात कालवून भात ओरपणे! माझ्या एका मित्राला ते करताना पाहिलं आणि मला त्या मित्रापेक्षा आंब्याची कीव आली. आंब्याची गाठ भाताशी मारणं हे मला एखाद्या गायिकेने औरंगजेबाशी विवाह लावण्यासारखं वाटलं.

आंब्याच्या मोसमात पूर्वी मला लग्नाला जायला आवडे. म्हणजे मी अशा काळाबद्दल म्हणतोय जेव्हा जेवणाच्या पंगती असत, बुफे नसे आणि जेवण हे मुंबईएवढं कॉस्मॉपॉलिटन नव्हतं. त्या वेळी सारस्वत लग्नातली कोरडी वडी, (जी ओली असून तिला कोरडी का म्हणत ते सारस्वत जाणे) पंचामृत आणि अनसा-फणसाची भाजी! ही भाजी त्या वेळी फक्त श्रीमंत सारस्वत लग्नात असे. कारण त्या भाजीत आंबा, अननस आणि फणस असे त्रिदेव असत. त्यामुळे तिला ग्रेट चव येई. त्या काळी सारस्वत लग्नात अनसा-फणसाची भाजी ठेवणं हा स्टेटस सिम्बॉल होता.

आंब्याचा उल्लेख रामायण, महाभारतातही आहे. तसंच पतंजलीचं महाभाष्य आणि पाणिनीची अष्टाध्यायी या ग्रंथांतसुद्धा आहे. जवळपास सर्वच धार्मिक विधी आंब्याच्या पानाशिवाय होत नाहीत.  कोणत्याही कलशावर आम्रपल्लव ठेवून मग त्यावर नारळ किंवा पूर्णपात्र ठेवतात.

हापूसपासून राजापुरी, तोतापुरी, बाटली आंबा वगैरे कुठलाही आंबा मला आवडतो आणि मी तो खातो. शाळा-कॉलेजात असताना एप्रिल-मे महिन्यात आंबा आणि सुट्टी या एवढ्याच दोन गुड न्यूज असायच्या. बाकी सर्वच बॅड न्यूज!

कुठल्याही रूपातला आंबा मला आवडतो. उदा. कैरी, कैरीचं पन्हं, लोणचं, मोरांबा, आंबटगोड लोणचे, आंबापोळी वगैरे वगैरे! फक्त आंब्याच्या कोल्ड ड्रिंक्सच्या वाटेला मी जात नाही. अवाजवी आणि फालतू साखरेला शरीरात यायचं आमंत्रण का द्या?

चला, आता दीड-दोन महिने आमच्या घरी मासळी, आयपीएलपेक्षा आंब्याची चर्चा जास्त असणार. पलीकडच्या कर्वेबाईंनी हापूस स्वस्तात मिळविल्याचा टेंभा मिरविल्यावर माझ्या बायकोचा चेहरा ख्रिस गेलचा कॅच सुटल्यासारखा होणार. पण पुढे आजचा मेनू काय, हा प्रश्न नवरा विचारणार नाही, याचं समाधान असणार. कारण बाजारातला हापूसच काय, बाजारातला शेवटचा बाटली आंबा संपेपर्यंत नवरा शांत असणार.

‘आंबामेव जयते!’

लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी.

#माझी_टवाळखोरी 📝

poetrymazi.blogspot.in, 

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

kelkaramol.blogspot.com 

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बार्गेनिंग पाॅवर… — ☆ प्रा. डॉ. सतीश शिरसाठ ☆

प्रा. डॉ. सतीश शिरसाठ

??

बार्गेनिंग पाॅवर… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

१ मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून जगभर मानला जातो. या निमित्ताने एक आठवण.

पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असताना आमच्या प्रौढ निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागातर्फे  काही समाजाभिमुख उपक्रम चालवले जात असत. त्यापैकी ‘असंघटित कामगार’ या विषयाचा मी समन्वयक होतो. असंघटित कामगारांची अनेक वैशिष्ट्ये मी अभ्यासली होती.अनेक ठिकाणी ही सांगतही होतो. त्यापैकी एकाचा नेमका अर्थ मला एका  घटनेतून समजला.

नवरात्रीनिमित्त बरीच खरेदी करायची होती. सारासार करून मी मंडईत गेलो.सायंकाळची वेळ होती.मंडईचा परिसर गर्दीने फुलून गेला होता.हे टाळण्यासाठी मी बाहेर बसलेल्या एका बाईकडं गेलो.

” बोला दादा” मला पाहून ती बाई सावरत बसत मला म्हणाली. घट,माती,फुलं वगैरे यादीतल्या  बहुतेक वस्तु मला तिथं मिळाल्याने मी खुष होतो.सगळं झाल्यावर ,” किती झाले?” असं विचारल्यावर तिनं आकडा सांगितला.

“नक्की द्यायचे किती?”

“पाच कमी द्या”.

” नाही मावशी.राऊंड फिगर देतो” असं म्हणून मी दहा रूपये वाचवले.

माझा हा  आनंद पुढं टिकला नाही.

मला आठवलं माझ्या मोबाईलचं   कव्हर अक्षरश: फाटलं होतं.एका दुकानात गेलो.

” बोलो सर”.

मी माझा मोबाईल दाखवून नवीन कव्हर मागितलं.दुकानदारानं किंमत सांगितली.

” नक्की द्यायचे किती “?

माझा प्रश्न ऐकताच त्यानं भिंतीवरच्या प्राईस लिस्टकडं  बोट दाखवलं 

” रेट फिक्स है|” हे वाक्य ” घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर फुटा” अशा टोनमध्ये म्हटलं. कव्हर बसवल्यावर त्यानं सांगितलेली रक्कम देऊन मी दुकानाबाहेर पडलो.

असंघटित क्षेत्रातील  कामगारांकडून  एखादी वस्तु किंवा सेवा घेताना ग्राहकांची बार्गेनिंग पाॅवर जास्त असते.संघटित क्षेत्रात मात्र अशी घासाघीस करता येत नाही हे  त्या घटनेतून मला  समजलं.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “एका राणीची गोष्ट” – लेखक : श्री विनीत वर्तक ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ “एका राणीची गोष्ट” – लेखक : श्री विनीत वर्तक ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

राजा राणीच्या अनेक गोष्टी आपण आजवर ऐकलेल्या आहेत, त्यातलीच ही एका राणीची गोष्ट.                                                                   

साधारण २००० वर्षांपूर्वी दक्षिण कोरियात ‘किम सुरो’ नावाचा एक राजा राज्य करत होता. इतर राजांप्रमाणे त्यानेही लग्न करून आपल्या म्हणजेच ‘करक राज्या’चा वंश पुढे वाढवावा, अशी इच्छा त्याच्या घरातील ज्येष्ठ लोकांची होती. पण त्या राजाला अशा एका राणीची गरज होती, जी या भूतलावर एकमेव आणि दैवी आशीर्वाद असलेली असेल. अशा राणीची वाट बघत असताना त्यांच्या राज्यापासून तब्बल ४५०० किलोमीटर लांब असलेल्या एका राजाच्या स्वप्नात ‘किम सुरो’ची इच्छा प्रकट झाली. त्याने आपल्या १६ वर्षांच्या मुलीला दक्षिण कोरिया इकडे किम सुरोशी लग्न करण्यासाठी पाठवलं. किम सुरोच्या स्वप्नातल्या राजकुमारीला समोर बघताच त्याने नकार देण्याचा प्रश्न नव्हताच. किमने तिचं नावं ठेवलं  ‘हिओ वांग ओक’.  त्या दोघांचं लग्न झालं आणि या दाम्पत्याने पुढे १२ मुलांना जन्म दिला. यातील १० मुलांनी राजाची म्हणजेच किम’ची वंशावळ पुढे नेली तर यातील दोन मुलांनी ‘हिओ’ ही वंशावळ पुढे नेली. आज दक्षिण कोरियामधील जवळपास ८० लाख कोरियन याच वंशावळीचं प्रतिनिधित्व करतात. या वंशावळीतील लोक इतर कोरियन लोकांच्या मानाने थोडे उंच आणि गहू वर्णीय असतात (इतर कोरियन रंगाने गोरे असतात). तसेच यांच्याकडे वंशपरंपरागत राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळालेली आहे. आजही अनेक कोरियन प्राईम मिनिस्टर आणि प्रेसिडेंट हे याच वंशाचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळेच त्यांच्या मनात आपल्या वंशाला जन्म देणाऱ्या ४५०० किलोमीटरवरून आलेल्या त्या राणीबद्दल आजही आदर आहे.

पण या दक्षिण कोरियन राणीचा आणि आपला काय संबंध असा प्रश्न आपल्या मनात येणं स्वाभाविक आहे. तर ही राणी दुसरी तिसरीकडून नाही तर प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान असलेल्या आणि जगातील समस्त हिंदुधर्मीयांचे पवित्र स्थान असलेल्या अयोध्येच्या राजाची मुलगी होती. जिचं नावं होतं ‘सुरीरत्न’. त्याकाळी अयोध्येच्या राजकुमारीचा प्रवास हा भारतातून दक्षिण कोरियाच्या गया (ज्याला आज ‘गिम्हे’ असं म्हटलं जातं) पर्यंत झाला. त्याकाळी समुद्रातून प्रवास करताना बोट उलटू नये म्हणून सुरीरत्नच्या बोटीत अयोध्येतील काही दगड ठेवण्यात आले होते. ज्याचा वापर बोटीला बॅलन्स करण्यासाठी केला गेला. हेच दगड आज दक्षिण कोरियात आज पुजले जातात. दक्षिण कोरियन लोकांच्या संस्कृतीत आज या दगडांना अनन्यसाधारण महत्व आहे. राजा किम सुरो आणि राणी सुरीरत्न हे दोघेही जवळपास १५० वर्षं जगले, असं कोरियन इतिहास सांगतो. दक्षिण कोरियाच्या ‘समयुग युसा’ या पौराणिक ग्रंथात राणी सुरीरत्नचा उल्लेख केलेला आहे. यात ही राणी ‘आयुता’ (म्हणजेच आजचं अयोध्या) इकडून आल्याचं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. 

कोरियन संस्कृतीत आपला इतिहास आणि वंशावळ याबद्दल खूप आदर असतो. त्यामुळेच आज २००० वर्षांनंतरही आपल्या वंशावळीचा आलेख एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केला जातो. याच कारणामुळे राणी सुरीरत्न (राणी हिओ वांग ओक) आणि राजा किम सुरो यांच्या वंशातील लोकांनी हा पिढीजात इतिहास जपून ठेवला आहे. भारतातील लोकांना भारताच्या इतिहासाबद्दल नेहमीच अनास्था राहिलेली आहे. भारतात इतिहासापेक्षा, ते कोणत्या जातीचे होते हे बघण्यात आणि त्यावर मते मांडण्यात इतिहासतज्ज्ञ धन्यता मानत असतात. पण आपल्या इतिहासाबद्दल जागरूक असणाऱ्या आणि अभिमान बाळगणाऱ्या कोरियन लोकांनी आपल्या लाडक्या राणीचं मूळ गाव शोधून तिच्या आठवणींना पुढे येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारत सरकारकडे पाठपुरावा केला. त्याचाच भाग म्हणून दक्षिण कोरियातील गिम्हे शहर आणि भारतातील अयोध्या शहरात एक करार झाला. दक्षिण कोरियन सरकारने आपल्या राणीचं एक स्मारक अयोध्येत बांधण्यासाठी भारत सरकारकडे परवानगी मागितली. त्याचाच भाग म्हणून २००१ साली १०० पेक्षा जास्ती इतिहासकार, सरकार अधिकारी ज्यांत चक्क भारतातील उत्तर कोरियाच्या वाणिज्य दूतांचा समावेश होता, ते शरयू नदीच्या तटावर बांधल्या जाणाऱ्या राणी सुरीरत्न (राणी हिओ वांग ओक) हिच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी हजर होते. 

दक्षिण कोरियाचे भूतपूर्व राष्ट्रपती किम-डे जुंग, तसेच दक्षिण कोरियाचे भूतपूर्व पंतप्रधान किम जोंग पिल यांच्यासह दक्षिण कोरियाच्या भूतपूर्व पहिल्या महिला किम जुंग सोक हे सर्व स्वतःला राणी सुरीरत्न (राणी हिओ वांग ओक) च्या वंशावळीतील मानतात. त्यामुळेच आपल्या राणीचं स्मारक भारतात भव्यदिव्य होण्यासाठी त्यांनी २०१६ साली उत्तर प्रदेश सरकारला खूप मोठी मदत केली. दक्षिण कोरियाचे तत्कालीन राष्ट्रपती मून जे इन यांनी सपत्नीक म्हणजेच किम जुंग सोक यांच्यासोबत दिवाळीत अयोध्येला भेट दिली. शरयू नदीच्या काठावर त्यांनी अयोध्येतील दीप सोहळा साजरा तर केलाच पण आपल्या वंशाला जन्म देण्यासाठी राणी सुरीरत्नचे आभारही मानले. 

राणी सुरीरत्न (राणी हिओ वांग ओक) हिच्या अयोध्येतील संबंधांबद्दल आजही इतिहासकारांत वेगळी मते असली, किंवा काही ठोस पुरावे नसले तरी दक्षिण कोरियातील त्यांचे वंशज मात्र भारतातील अयोध्येला आपल्या राणीचं जन्मस्थान मानतात. जिकडे ४०० वर्षं जुन्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या इतिहासावर वेगवेगळे दावे केले जातात, तिकडे २००० वर्षं जुन्या इतिहासाबद्दल बोलायला नको. कसंही असलं तरी राणीचे वंशज मात्र भारतातील आपल्या उगमस्थानाबद्दल ठाम आहेत. त्यामुळेच आजही हजारो कोरियन लोक अयोध्येत राणी सुरीरत्न (राणी हिओ वांग ओक) हिच्या जन्मस्थानाला आठवणीने भेट देतात. ज्यात प्रत्येक वर्षी भर पडत आहे. त्याचवेळी भारतीय मात्र अयोध्येतील या इतिहासाबद्दल संपूर्णपणे अनभिज्ञ आहेत. किंबहुना असा इतिहास जतन करायचा असतो, हे समजण्याची वैचारिक पातळी त्यांनी गाठलेली नाही असे नमूद करावे वाटते. आजही आमचा इतिहास हा प्रभू श्रीरामाची जात ते शिवछत्रपतींची जात कोणती यापर्यंत मर्यादित आहे. कारण जातीपातीच्या राजकारणापलीकडे इतिहास शिकण्याची गरज आणि आवड आमच्यात निर्माण झालेली नाही. 

राणी सुरीरत्न (राणी हिओ वांग ओक) आणि तिने दक्षिण कोरियात नेलेल्या अयोध्येतील दगडांची आठवण म्हणून भारतीय टपाल खात्याने २५ रुपयांचं एक टपाल तिकीट काढलेलं आहे. ज्यात भारताने आपल्या राणीचा थोडा तरी योग्य सन्मान केला आहे, असे वाटते. भारत ते दक्षिण कोरिया हा एका राणीचा प्रवास जसा दक्षिण कोरियन लोकांसाठी खास आहे, तसाच तो भारतीयांसाठीही असावा अशी मनोमन इच्छा…! 

जय हिंद!!!

(आपलं मूळ शोधण्याची ही असोशी जगाला एकत्र आणू शकते… फक्त प्रामाणिक इच्छा हवी… शोध घेण्याची आणि जे सापडेल त्याचा आदर करण्याची…!) 

© श्री विनीत वर्तक 

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ विंचवीची कथा… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

? इंद्रधनुष्य ?

☆ विंचवीची कथा… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

तुम्हाला हे माहिती आहे का?.. विंचवी म्हणजे मादी विंचू हिच्या आयुष्याची एक भयानक कथा आहे… ती मुलांना जन्म दिला की तिचे आयुष्य त्याच क्षणी फक्त आणि फक्त आपल्या पिल्लाना वाचविण्यासाठी पूर्णपणे समर्पित करते … •• विंचू •• विंचवाविषयी आपल्याला काय माहित आहे? विंचू डंख मारतो, इतकच ना?

तुमच्या माहितीत एक अजुन भर घालणार आहे. विंचवाची मादी विंचवी म्हणुयात तिला.

श्रेष्ठ मातृत्व समजायचं असेल तर विंचवीला भेटलंच पाहिजे. विंचवी प्रसवते म्हणजे बाळंत होते तेव्हा सरासरी तिला सहा सात पिलं होतात,अगदी अंगठ्याच्या नखावर मावतील एवढी.काही तासांनी पिलांना भुक लागते,निसर्गाचा कोप झालेल्या जीवापैकी एक म्हणजे विंचवी. तिला पिलांच पोषन करण्यासाठी कुठलीच व्यवस्था नाही. कासवा विषयी आपल्याला माहित असेलच; कासवाची आणि पिलांची केवळ नजरानजर झाली की पिलांच पोट भरतं. ईथे त्याहुनही गंभीर समस्या आहे. विंचवीकडे अशी कुठलीच सोय नाही. आता हळुहळु पिलांची भूक अनावर होऊ लागते. विंचवी बिचारी कासाविस होते, पण द्यायला तर काहीच नाही. पिलं तिला चावा घ्यायला सुरुवात करतात ती अंग चोरुन निमुट बसुन रहाते. आता पिलांची भूक अनावर होते, ते विंचवीचेच लचके तोडायला सुरुवात करतात, पहाता पहाता पिलं पोट भरुन तृप्त झालेली असतात, आणि विंचवी… विंचवी… हो ती स्वतःच्या पिलांना तृप्त करण्यासाठी स्वतः संपूर्णपणे समर्पित झालेली असते !

याला म्हणायचं आईचं आईपण. “आई “मग ती मुंगी, शेळी, वाघीण, गाय असो कि तुमची माझी माय असो, आईपण तेच ! मातृत्व अशी जादु आहे कि जिच्या दातृत्वापुढे देवही फिके आहेत. ज्याला आई समजली त्याला विश्व समजलं. या जगात तुमचा कोणताही अपराध पोटात घालण्याची ताकद फक्त तुमच्या आईबाबांमधे आहे.कारण ते कुठल्याही स्वार्थाशिवाय तुमच्यावर प्रेम करतात. आपल्या आईबाबांना खूप प्रेम द्या. कारण तीच खरी भक्ती आणि देवपूजा आहे. 

तुकोबा म्हणतात,

मायबापे केवळ काशी ।

तेणे न जावे तिर्थाशी ।।

प्रस्तुती : श्री आशिष बिवलकर 

बदलापूर – मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ घड्याळ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ घड्याळ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

जेवताना सहज घड्याळाकडे लक्ष गेले. आजपर्यंतच्या आयुष्यात घड्याळ किती वेळा पाहिले हे मोजताही येणार नाही. पण आज पाहिले आणि घड्याळयाच्या तीन काट्यात आणि परिवारात काही तरी साम्य जाणवले.

घड्याळ्यात तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा असतो. तसेच परिवारातील तास काटा म्हणजे वडील, मिनिट काटा म्हणजे आई व सेकंद काटा म्हणजे मुलं असल्याचे जाणवले.

या प्रत्येक काट्याला फिरण्याची आपली गती आहे, प्रत्येकाची गती वेगळी आहे, पण दिशा मात्र एकच आहे. पण प्रत्येकाच्या गतीचे एक वर्तुळ पूर्ण झाल्याशिवाय सेकंद, मिनिटे आणि तास पूर्णत्वास येऊ शकत नाहीत .

परिवारात वडील म्हणजे तास काटा. याची गती सगळ्यात कमी असली तरीही तो एका ठाम गतीने व उद्देशाने पुढील तासाच्या आकड्याकडे सरकत असतो. पण तास पूर्ण झाल्याशिवाय त्याची गती लक्षातच येत नाही. त्याच प्रमाणे वडिलांचे काम असते. ते एक एक ध्येय डोळ्यासमोर ठेऊन ठामपणे आपला प्रवास करीत असतात.

पण ते घरातल्या कोणाच्याच लक्षात नसते.

ध्येय पूर्ण झाल्यावरच त्यांची गती लक्षात येते.

तोपर्यंत वडिलांचे महत्त्व लक्षात येत नाही.

आई म्हणजे मिनिट  काटा असते.प्रत्येक मिनिटाला (अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत) तिची गती जाणवत असते. ती सतत चालत, विचारमग्न, आणि कार्यमग्न असते. मिनिट काटा जसा घड्याळ्यात फिरताना कधी तास काट्याच्या मागे असतो, थोड्या वेळाने थोडा काळ तो तासकाट्या बरोबर थांबतो व नंतर परत तास काट्याला मागे टाकून त्याची ओढ सेकंद काट्याकडे असते. अगदी तसेच आईचे असते. सतत कामात असताना नवऱ्याच्या मागे पडल्यावर ती पुढे येऊन नवऱ्याला गाठून काही काळ नवऱ्याच्या बरोबरीने काम करते व नंतर परत मुलांचे सगळे करायचे आहे, या प्रेमापोटी मुलांच्या (सेकंद काट्याच्या) मागे जाऊन त्यांच्या बरोबरीने राहण्याचा प्रयत्न करते.

आणि सेकंद काटा म्हणजे लहान मुलं.ती कितीही मोठी झाली तरीही आईवडिलांच्या मागे पुढे कायम उत्साहाने तुरुतुरु पळताना, खेळताना, बागडताना दिसतात. ती सतत तास काटा आणि मिनिट काटा (वडील, आई) यांच्या मधेच धडपडताना दिसतात. त्यांचा पुढे पुढे सरकण्याचा वेगही वडील आणि आई यांच्यापेक्षा जास्त असतो.

जसे घड्याळाला तीन काटे व त्यांच्या एकाच दिशेच्या गतीशिवाय पूर्णत्व येत नाही, तसेच अगदी आपल्या कुटुंबाचे आहे. या तीन काट्यांप्रमाणे आपल्या कुटुंबातील वडील, आई,आणि मुलं या़ची गती एकाच दिशेनं असल्याशिवाय घराला पूर्णत्व येत नाही.

पण हे लक्षात ठेवा की सेकंद, मिनिटे, तास या मुळे दिवस, आठवडे, महिने, वर्षे हे पूर्ण झाले तरी यासाठी काटे आपली चौकट (घड्याळाची तबकडी) सोडत नाहीत. तशीच आपण आपल्या कुटुंबाची चौकट सांभाळायला पाहिजे.

 एक जरी काटा चुकला तरी वेळ चुकते,  तसेच कुटुंबातील एक जरी सदस्य (काटा) चुकला

 तर कुटुंबाचे घड्याळ बिघडून गोंधळ उडेल.

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आम्हीं तो चिरंतनाचें पाईक…  ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? विविधा  ?

☆ आम्हीं तो चिरंतनाचें पाईक…  ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

“सर, तुमच्या शिबिरात आल्यावर आमच्या मुलाला सकाळी लवकर उठायची सवय लागेल ना?”

“सर, आमची मुलगी झोपेतून उठल्यावर अंथरुणाची घडी सुध्दा घालत नाही. तिला ती सवय लागेल ना?”

“सर, हा आमचा मुलगा भाज्याच खात नाही. हॉटेल मधलं सगळं बरोब्बर खातो. पण घरचं जेवणच नको असतं त्याला. भाज्या नकोत, फळं नकोत, आणि उपदेशही नकोत असं आहे त्याचं. तुमच्या सोबत आला तर तो भात-वरण-पोळी-भाजी खाईल ना?”

“सर, धांदरटपणा अन् विसराळूपणा कमी व्हावा म्हणून आमच्या मुलाला तुमच्या कॅम्पला पाठवायचंय बघा. “

‘अनुभूती’चे वारे वाहायला लागले आणि नोंदणी सुरु झाली की, असे कितीतरी फोन रोज सुरु होतात.

उन्हाळी शिबिरं, छंद वर्ग आणि सहली यांचा खरा उद्देश कोणता, अन् पालकवर्ग त्याकडं कोणत्या दृष्टीनं पाहतो आहे, यातलं अंतर दिवसेंदिवस वाढतच चाललंय असं वाटतं. आपल्या मुलांना आपण नेमकं काय द्यावं आणि आपल्या मुलांनी नेमकं काय शिकावं, याची खरोखरंच नेमकी जाणीव पालकवर्गाला आहे का? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे नदीचं मूळ शोधण्याइतकं कठीण होऊन बसलं आहे. घरचं जेवण करण्याची अन् बटाटा सोडून बाकीच्या भाज्या खाण्याची सवय लागावी यासाठी उन्हाळी शिबिर लागतं? कमाल वाटते मला.

“मोबाईल फोन नसेल तर मी जाणार नाही त्या सहलीला. ” इति वय वर्षे १५..

“आई, तुला माहितीये ना, मला एसी लागतो. एसी असेल तरच जाईन मी ट्रेकला. “असं एका मुलानं घरी ठणकावून सांगितलं. (आता महाराजांच्या गडकोटांवर एसी कुठून आणायचा?)

“त्याला नं कालवलेला भात लागतो पानात. रोज पनीर लागतं. सकाळी एक डबल ऑम्लेट आणि एक बॉईल्ड एग लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमोडची आणी गरम पाण्याची आंघोळीची सोय हवी. तुमच्या कॅम्पमध्ये या गोष्टी मिळतील ना?” असाही एका आईचा फोन होता.

काही जण तर इतके धन्य असतात की, त्यांचा शनिवारवाड्याच्या दिल्ली दरवाजासमोर जाहीर नागरी सत्कारच केला पाहिजे. एका पालकांचा चौकशीसाठी फोन आला. “मुलं रोज कुठं कुठं राहणार आहेत, काय खाणार आहेत, किल्ल्यावर कोणत्या ठिकाणी आहेत याचं जीपीएस लोकेशन तुम्ही पालकांना दर तासातासाला पाठवलं पाहिजे. त्याशिवाय आम्हाला कळणार कसं?” हे ऐकताच मी धन्य झालो.. पण समोरुन सुलतानढवा चालूच राहिला.

“गडाच्या पायथ्याला राहणाऱ्या माणसांच्या हातचं जेवायचं म्हणताय. पण ते ऑईल कुठलं वापरतात, धान्य कुठलं वापरतात हे तुम्ही माहिती करुन घेता का ? ते लोक सॅनिटायझर तरी वापरत असतील का? स्वयंपाकाला कुठलं पाणी वापरत असतील? आणि अल्युमिनियम च्या भांड्यातच अन्न शिजवत असतील. म्हणजे ते अजूनच अनहेल्दी.. कशी पाठवायची आमची मुलं?” मी शांतपणे हा तोफखाना अंगावर घेत राहिलो. समोरचा दारूगोळा संपल्यावर फोन ठेवून दिला.

पिझ्झा हट अन् मॅकडॉनाल्ड्स संस्कृतीत वाढलेल्या अन् मिसळ खाताना बोटांना तर्रीचं तेल लागतं म्हणून टिश्यू पेपरचं डबडं शेजारी घेऊन बसणाऱ्यांना सह्याद्रीची मुलुखगिरी स्वतः करणं फार अवघड आहे.

“तुम्ही रोज रात्री पुण्यात मुक्कामी येणार ना?” हा प्रश्न तर माझ्यासाठी “गिटार वाजवून झाल्यावर रोज तारा काढून ठेवायच्या ना?” असा होता. यावर मला नेमकं काय उत्तर द्यावं हेच सुचेना. असे शेकडो फोन अन् चित्रविचित्र प्रश्न.. ! डोकं चक्रावून जातं..

या माणसांच्या जगण्याच्या कल्पना तरी काय आहेत, अन् रोजचं आयुष्य ही माणसं कशी जगत असतील, या विचारानं मन अस्वस्थ व्हायला लागतं. आज नुकतीच वयात येऊ घातलेली यांची मुलं पुढं जगतील कशी? जगाशी जुळवून घेतील कशी? यांना माणसं जोडता येतील का? दुर्दैवानं करिअर मध्ये बॅडपॅच आला तर काय करतील? असे प्रश्न पडायला लागतात. अशा कितीतरी जणांना “अनुभूती तुमच्या मुलांसाठी योग्य नाही. त्याला दुसऱ्या एखाद्या कार्यक्रमाला पाठवा. ” असं सांगून नकार द्यावा लागला. कारण, “अनुभूती” हा आम्हीं आखलेला कार्यक्रमच वेगळा आहे. त्याचा बाजच वेगळा आहे. त्यात इतिहास आहे, शौर्य आहे, धाडस आहे, संस्कृती आहे, सामाजिक बांधिलकी आहे, जिव्हाळा आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रीयत्व आहे.. !

प्रभाव ही फार विलक्षण गोष्ट आहे. ती विकतही मिळत नाही आणि कुणाकडून उसनीही घेता येत नाही. आपल्याला आयुष्यात उत्तम यश मिळवायचं असेल, चांगलं व्यक्तिमत्त्व घडवायचं असेल तर, त्यासाठी उत्तम प्रेरणा हवी. आणि उत्तम प्रेरणेचा मार्ग प्रभावाच्या पोटातूनच जातो. तो प्रभाव निर्माण करणारा कार्यक्रम म्हणजेच ‘ अनुभूती’… !

खेडोपाडी राहणाऱ्या, वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या माणसांचं आर्थिक स्थैर्य भक्कम नसेलही. पण, त्यांचं त्यांच्या परंपरेशी आणि सांस्कृतिक पूर्वपीठिकेशी असलेलं नातं अजूनही कणखर आणि मजबूत आहे. चार-चार शतकांपासून ही माणसं गडांवर नांदलेली.. यांच्या पूर्वजांनी कदाचित महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेलं असेल. एखाद्या मोहिमेत हाती समशेर धरली असेल. शत्रूच्या आक्रमणांना अन् तोफगोळ्यांना तोंड देत यांनी गड झुंजवला असेल. कुणास ठाऊक.. पिंपळाचं झाड शेकडो वर्षं जुनं असलं तरी त्याच्या प्रत्येक पानाची वंशावळ, कारकीर्द अन् चरित्र कुणी लिहीत बसत नाही. ह्या माणसांच्या पूर्वजांचंही असंच आहे.

ब्रिटिश राजवटीत गड किल्ल्यांच्या अस्तित्वावरच जी संक्रांत येऊन बसली, ती काही केल्या हटायलाच तयार नाही. त्यामुळं, पिढ्या न् पिढ्या गडावर जगलेल्या या परिवारांना देशाच्या स्वातंत्र्यानंतरच खरी दृष्ट लागली. गडाच्या वस्तीकऱ्यांनाच गड सोडावे लागले. ऐतिहासिक वास्तू संरक्षित म्हणून घोषित व्हायला लागल्या. पण आज पन्नास वर्षांहून जास्त काळ उलटून गेला तरीही महाराजांच्या गडांवरची दैवतं उन्हा-पावसाचे तडाखे खात उघड्यावरच आहेत. मग त्यात कितीतरी मारुतीराय आहेत, गणपती आहेत, शिवलिंगं आहेत.

शिवाजी महाराजांच्या काळात रोजच्या रोज पुजली जाणारी देवालयं आज भग्न अवस्थेत पडली आहेत. कितीतरी गडांवर भग्नावस्थेतले नंदी आहेत. रोज संध्याकाळी देवाला दिवा लावायलासुध्दा माणसं राहिली नाहीत, सणावारांना नैवेद्य नाही. आज त्यांच्याबद्दल कुणाच्या काय भावना आहेत?

अशाच एका गडावर मुलांना घेऊन गेलो होतो. शिवाजी महाराजांनीच बांधलेला किल्ला. गडाच्या घेऱ्याशी आम्ही उभे होतो. मी गडाच्या बांधणीविषयी मुलांशी गप्पा मारत होतो. मागून पाच सात जणांचं एक टोळकं आलं. आमच्यापाशी थांबलं. त्यांना मागचा पुढचा संदर्भ काहीच ठाऊक नव्हता. सहावीत शिकणाऱ्या एका छोट्या मुलानं “पण महाराजांनी इथंच का बरं किल्ला बांधला असेल?” असा प्रश्न विचारला. मी काही उत्तर देणार तेवढ्यात “महाराज नाही, छत्रपति शिवाजी महाराज असं म्हणायचं. समजलं का?” असं त्यांच्यातल्या एकानं दरडावलं अन् खिदळत पुढं गेले. थोड्या वेळानं आम्ही चढणीच्या एका टप्प्यावरच्या मारुतीपाशी थांबलो. (हजारो माणसं गडावर येतात. सेल्फी काढून निघून जातात. पण हे मारुतीराय मात्र अजूनही उपेक्षितच राहिले आहेत. ) बघतो तर, ही मंडळी मारुतीपाशीच जेवायला बसलेली. मोबाईल फोनवर “पाटलांच्या बैलगाड्यानं घाटात केलेला राडा” सुरु होता. गौतमी पाटील बाई कशा नाचतात, याच्या सुरस कथा सुरु होत्या. अन् जेवणाच्या डब्यात अंड्यांची भुर्जी होती… ! हे सगळं मारुतीपाशी.. !

कितीतरी किल्ल्यांवर प्लॅस्टिकच्या बाटल्यांची अन् पिशव्यांची रानं माजली आहेत. कागदी प्लेट्स, कागदी कप, वेफर्सची पाकीटं पडलेली असतात. “संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. ” असं आज्ञापत्रात म्हटलंय, ते कितीजणांनी वाचलंय ? गडकिल्ले हे प्रेरणास्थान आहे की पर्यटन स्थळ आहे ? याचा निर्णय व्हायला हवा. “आम्ही गडांवर जातो” हे सांगणं सोपं आहे. पण तिथं जाऊन आम्ही काय केलं, कसे वागलो हेही सांगितलं पाहिजे. महाराजांची दौलत राखायची म्हणजे नेमकं काय करायचं ? हे समाजाला सांगायला हवं.

“हर हर महादेव” या गर्जनेचा अर्थ समजून घेताना उगवत्या पिढीला त्यांची जबाबदारी शिकवण्याचं सुध्दा दायित्व आहेच ना. म्हणूनच, “अनुभूती” येणाऱ्या एकाही मुलाकडं प्लॅस्टिकचं काहीही सापडणार नाही. प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या, कागद गडांवर न्यायचेच नाहीत, हा नियम गेली १८ वर्षं ‘अनुभूती’ नं कटाक्षाने पाळला आहे. उलट, गड किल्ल्यांवर असा कचरा दिसला तर, तो गोळा करुन पायथ्याला आणण्याचं काम सुध्दा मुलांनी केलं आहे.

“महाबळेश्वर, खंडाळा, पाचगणी आलो होतो म्हणून सहज फिरता फिरता प्रतापगडावर आलो. कांद्याची गरमागरम भजी खाल्ली, चहा घेतला आणि आता निघालो परत. ” अशी कितीतरी माणसं तिथं रोज भेटतील. पण तिथं राजांनी अफजलखानाशी युद्ध करताना जी योजना केली होती, त्याचा नकाशा लावलेला आहे, तो कुणी पाहत नाहीत. किंबहुना त्यांच्या ते गावीही नसतं. ढालकाठीपाशी जाऊन फोटो काढणं एवढंच डोक्यात असतं. कुल्फी खात खात तटावरून फिरायचं अन् नंतर कुल्फीची काडी तिथंच फेकून द्यायची, ही लोकांची स्वाभाविक सवय आहे. बुरुजांच्या जंग्यांमध्ये पाण्याच्या बाटल्या खुपसणं, हे तर कॉमन आहे.

पुस्तकी शिक्षण घेऊन साक्षर होता येईल. पण आपल्या पूर्वजांचं कर्तृत्व जतन करण्याच्या साक्षरतेचं काय? तिथल्या निसर्गाच्या जोपासनेचं काय ? तिथल्या लोकजीवनाचं काय ? याचा विचार आणि भान घडत्या पिढीच्या मनात रुजवलं पाहिजे.

एखाद्या गडाच्या पायथ्याच्या वस्तीतल्या अंगणात रात्री जा. तिथली भाकरी-भाजी अन् वाफाळत्या भाताचं जेवण करा, आणि आकाशाकडं बघत बघत तिथंच अंगणात पथारी पसरून ताणून द्या. पडल्या पडल्या जी झोप तिथं लागते ना, तिला ‘सुखाची झोप’ म्हणतात. दुपारच्या सुमारास बांधावरच्या एखाद्या आंब्याच्या झाडाखाली बसून तर बघा. सूर्य उतरणीला लागला की, त्याच्या केशरी प्रकाशात एखाद्या ओढ्यात मनसोक्त डुंबून बघा. ऑनलाईन गेम्स खेळण्यापेक्षा एखाद्या वाडीतल्या मुलांसोबत कोंबड्या पकडून डालग्यात कोंबण्याचा खेळ खेळून बघा. रात्री मारुतीच्या देवळात भजनाला जा. तुम्हाला असं काहीतरी नक्की गवसेल, जे कदाचित शब्दांत व्यक्त करता यायचं नाही. पण जो आनंद आणि समाधान तिथल्या वास्तव्यात मिळेल, तो कुठल्याही मॉलमध्ये नाही मिळणार, हे नक्की.

असा आनंद, उत्साह घरबसल्या मिळणार नाही. त्यासाठी घराचा उंबरा ओलांडून बाहेर पडायला हवं अन् मोकळेपणानं स्वतःला निसर्गाशी जोडता यायला हवं. आपलं शहरी शहाणपण सोडून देऊन प्राणी, पक्षी, झाडं, वेली, जंगलं, लेणी, मंदिरं यांच्या सानिध्यात रहायला हवं. आपल्या मुलांना मुक्त करुन पहा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला बहराची जी नवी पालवी फुटेल ना, ती शब्दातीत असेल…!

(चित्र साभार फेसबुक वाल – श्री मयुरेश उमाकांत डंके)  

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानस तज्ज्ञ, संचालक- प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे. 

मो 8905199711

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मातृदिनामित्त : आई म्हणजे — ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

??

☆ मातृदिनामित्त : ‘आई‘ म्हणजे…  डॉ.सोनिया कस्तुरे ☆

प्रत्येक माणसात आईपण येवो 

         आणि

 हे जग आणखी सुंदर होवो.

 

   निर्हेतूक, निर्व्याज, निरपेक्ष प्रेम म्हणजे आई.. ! 

  आई होणं म्हणजे मानवतेची सर्वोच्च उंची गाठणं.. !

  आई म्हणजे वात्सल्यपुर्ण पालकत्व

  आई म्हणजे समंजस स्वीकार आणि शहाणपण

   आई म्हणजे कष्ट, सहनशीलता, समर्पण, वेदना संवेदनांची नेणिवेत गेलेली जाणिव..

   आई म्हणजे खूप काही न संपणार, न आटणार, सांगता न येणारं..

   आई म्हणजे विशालत्व

       केवळ जन्म देते तिच आई असते असे नाही. आई कोणीही होऊ शकते.

      प्रेम आणि करुणेने भरलेले हृदय ज्याच्याकडे आहे ते कुणीही आई होऊ शकतात.

    स्त्री-पुरुष दोघातही आईपण असतेच.

पुरुषाने स्वतःतील आईपण उदयास येऊ द्यावे.. ! ज्याचा त्याला स्वतःला आणि सगळ्या कुटुंबाला, समाजाला फायदा होईल

      

  जेव्हा सगळ्यांना माणूसपणा सोबत आईपण अनुभवता येईल तेव्हा जग सुखी होईल.. !

   आईच्या शारीरिक मानसिक आरोग्यावर कुटुंबाचे आरोग्य अवलंबून असते  हे विसरुन चालणार नाही.

     मातृदिनाच्या खूप शुभेच्छा ! 

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “भिकूसासेठ…” – संकलन : श्री माधव सावळे ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

??

☆ “भिकूसासेठ” – संकलन : श्री माधव सावळे ☆ श्री मोहन निमोणकर

साधारण वीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. सकाळी साडेसहाची वेळ. मित्राचं पेठेत दुकान आहे. बाबा गावाला जायचे होते म्हणून त्यांना सोडायला, स्टॅन्डवर गेलो होतो. येता येता त्याच्याकडे डोकावलो.

आमचा हा मित्र सकाळी सव्वासहाला दुकान उघडतो. दुकान चालतंय कसलं… पळतय.

नीचे दुकान ऊपर मकान.

जनरल कम किराणा.

दूध, ब्रेड, बटर, अंडी, केक, बिस्कीटं,

घडीच्या पोळ्या घेणारी गिऱ्हाईकं सकाळ पासून गर्दी करायची.

दुकानापाशी पोचलो. दुकानासमोरचा डांबरी रस्ता. तेवढा तुकडा छान झाडून घेतलेला. पायरीपाशी कोपऱ्यात एक स्टीलची रिकामी बादली. मित्रानं पाण्याचा छान सडा घातला होता.

पाण्याचा छान ओलेता वास येत होता.

पायरीसमोर वहिनी छान रांगोळी काढत होती.

मी दुकानात शिरलो. पाठोपाठ वहिनी सुद्धा घरात शिरली. पाच दहा मिनटं गप्पा झाल्या. मग बेल वाजली.

दुकानातला पोरगा वर जाऊन चहाचा ट्रे घेऊन आला. बेल वाजणं म्हणजे चहा तयार आहे.

घुटक घुटक चहा घेत होतो. एवढ्यात एक माणूस दुकानात शिरला. पांढरा शुभ्र पायजमा. पांढरा बंडीसारखा शर्ट.

डोक्यावर गांधी टोपी.

 

“नमस्कार मालक. कसे आहात ?”

मित्र लगेच उठला. काऊंटरची फळी उघडून त्यांना आत घेतलं. बसायला खुर्ची दिली. पटकन वरची बेल वाजवली.

 

पाच मिनटात पुन्हा चहा आला. एकंदर बडी आसामी असावी.

 

“मालक एक विनंती आहे. वहिनी रोज पायरीपुढे रांगोळी काढते. तू देवाला हारफुलं वाहतोस. उदबत्ती लावतोस.

प्रसन्न वाटतं. पन तू रोज बादलीभर पाणी मारतो ना रस्त्यावर. ते नको करत जाऊस बाबा. पाणी वाया जाते अशान्.

पाण्यामदी जीव असतो. पाणी देव हाये आमच्यासाठी. देवाचा अनमान करू नका माऊली… “

 

पाच दहा मिनटं गप्पा मारून पाहुणे गेले.

” कोण हे ?” मी विचारलं.

‘तू ओळखलं नाहीस ?’

‘नाही बुवा.

‘भिकूसाशेठ. चोपडा ज्वेलर्सचे मालक. एकदम सज्जन माणूस. सचोटीनं धंदा करतोय गेली अनेक वर्ष. शून्यातून उभं केलंय सगळं. एम जी रोडवरची मोठी पेढी. उपनगरातही मोठं दुकान चालू केलंय नुकतंच. घनो चोखो धंदो. पण म्हाताऱ्याला वेड लागलंय. सकाळी सकाळी गावभर हिंडत असतो. कुणी दुकानापुढं सडा घालताना दिसला, की हात जोडून उभा राहतो. पाणी वाया घालवू नका म्हणतो. लोकं तेवढ्यापुरतं ऐकतात.. तो पुढं गेला की रस्ते पुन्हा ओले. आपला गाव कसाय तुला माहित्येय. बहुतेक नळांना तोट्याच नाहीत. पाणी भरून झालं तरी नळ तसेच वाहत असतात. शेकडो लीटर पाणी वाया जातं. भिकूसाशेटच्या चुलतभावाचं हार्डवेअर शाॅप आहे.

शेटच्या हातात एक पिशवी असते.

पिशवीत पान्हा आणि तोट्या. वाहतं पाणी दिसलं की हा तिथं जातो. तोटी लावून देतो. स्वखर्चानं…!! मान्य की पाणी वाया जातं. पण दुकानापुढं पाणी मारलं की धूळ खाली बसते. जरा गारवा वाटतो. हे याला कोण सांगणार? बरं, इथं पाणी वाचलं तरी ते तिकडे दुष्काळी भागात कसं पोचेल?म्हाताऱ्याची सटकलीय, झालं.

मला हे माहितच नव्हतं. मला यात स्टोरीचा वास आला. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हाताऱ्याला गाठला. तो आणखीन एका दुकानात शिरला होता. ” सकाळी दुकानापुढे पाणी मारू नका हो. “

 

त्याची आर्जवं, त्याची विनवणी.

त्याच्या हातातली पिशवी, तोट्या.

सगळं रेकाॅर्ड केलं. न्यूज चॅनलला पाठवून दिलं.

 

पेपरमधे छापून आलं. म्हातारा एका रात्रीत फेमस झाला.

 

तरीही बदलला नाही. त्याची रोजची प्रभातफेरी चालूच राहिली.

 

आताशा दुकानदारांना लाज वाटायला लागली. डांबरी रस्त्यांवरचे ओले सडे जवळजवळ बंद झाले. उघड्या नळाचं वाहतं पाणी बंद झालं.

 

न्यूज चॅनलवाल्यांनी याचं पुन्हा एकदा फीचर केलं. त्याचा छोटासा इंटरव्ह्यू घेतला.

 

ढसाढसा रडला म्हातारा. म्हणाला,

“‘मारवाडातलं गाव होतं माझं…. पण एकदम कोरडं ठाक!! पाण्यासाठी चार चार किलोमीटर वणवण फिरायची आई माझी. आणि आईबरोबर मीही.

एक एक थेंब प्राण कंठाशी आणायचा.

पाण्यात देव दिसायचा. इथली उधळमाधळ बघितली की जीव तुटतो माझा. मला पता आहे, लोक माघारी माझी टिंगल करतात. पन धापैकी एक मानस तरी ऐकतो. माझा काम झाला की मग…. !!*

https://chat. whatsapp. com/FU11b9n72pz92KmqofpUhr

त्याचा इंटरव्ह्यू ऐकला आणि मला, त्या म्हाताऱ्यातच देव दिसू लागला.

 

मागच्या महिन्यात गावी गेलो होतो.

बऱ्याच वर्षांनी. पेठेतल्या मित्राच्या दुकानी पोचलो सकाळी सकाळी.

 

एकदम आठवण झाली.

“त्या भिकूसाशेटचं काय झालं ?”

“पेठेतलं दुकान बंद झालं त्यांचं. “

“का बरं?”

“झालं म्हणजे त्यानंच बंद केलं. रिटायरमेंट म्हण ना!! उपनगरातलं चाललंय जोरात. ते दुकान पोरं सांभाळतात. कोटी कोटींची उड्डाणं.

म्हाताऱ्यानं त्यातल्या एका पैशालाही हात लावला नाही. डोंगरगावला मोठी टाकी बांधून दिली आईच्या नावानं.

बायाबापड्यांचे ऊन्हाळ्यात फार हाल व्हायचे. तिकडं नळाला पाणी आलं, आणि इकडं म्हाताऱ्यानं डोळे मिटले.. “

 

दोन मिनटं कुणीच कुणाशी बोललं नाही.

 

ग्रेट होता भिकूसाशेट.

 

मी मनातल्या मनात त्याला हात जोडले… आणि निघालो.

 

कालचीच गोष्ट.

 

सोसायटीत एक जण रोज गाडी धूतो.

त्याला गाठला. हात जोडून विनंती केली, ” रोज नको, आठवड्यातून एकदा धूत जा “

 

त्यानं ऐकलं. मी खूष.

 

एकदम भिकूसा आठवला.

डोंगरगावचा नळ माझ्या डोळ्यातून ठिबकू लागला.

सर्वांना स्पेशल विनंती.. लाईक नाही केलं तरी चालेल पण सध्या उन्हाळा आहे. थोडं पाणी जपून वापरा ही नम्र विनंती…

 

संकलन : प्रा. माधव सावळे

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक ‘अग्निसाक्षी’ सैनिक ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

एक ‘अग्निसाक्षी’ सैनिक ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

लेफ्टनंट कमांडर धर्मेंद्रसिंग चौहान

मध्यप्रदेशातील रतलाम नावाचं त्याचं जन्मगाव समुदसपाटीपासून सुमारे ४८० मीटर्स उंचीवर आणि कोणत्याही समुद्रकिना-यापासून शेकडो किलोमीटर्स दूर! पण छोट्या धर्मेंद्रला लहानपणापासूनच समुद्राचं आकर्षण होतं आणि त्यापेक्षा जास्त समुद्रात लाटांवर स्वार होत क्षितीजापर्यंत आणि क्षितीजाच्याही पल्याड जाण्या-या नौकांचं. पावसाळ्यात वाहत्या पाण्यात सोडल्या जाणा-या कागदी होड्या त्याला फारशा भावायच्या नाहीत. उलट इतिहासाच्या पुस्तकातल्या जुन्या लढाऊ जहाजांची मोहिनी त्याला पडली होती. जहाजं एवढी मोठी असतात आणि तरीही ती पाण्यावर सहजपणे तरंगत जातात तरी कशी असा प्रश्न त्याच्या बालमनाला सहज पडत असे.

हे आणि असेच काही प्रश्न मनात घेऊन हा मुलगा इंजिनीअर झाला. अर्थातच उत्तम नोकरी शोधावी आणि गृहस्थाश्रमात पडावं असं त्याला आणि त्याच्या पालकांना वाटणं साहजिकच होतं. पण धर्मेंद्र सिंग यांनी अभियांत्रिकी पदवी मिळवली होती ती सेनादलात जाण्यासाठीच. भारतीय नौदलात नौसैनिक अधिका-यांची भरती निघताच धर्मेंद्रसिंग यांनी आपली सारी बुद्धीमत्ता, शारीरिक क्षमता पणाला लावून भारतीय नौसेनेचा चमकदार सफेद गणवेश अंगावर चढवलाच. त्यांच्या डोक्यावरची नौसेनेची विशिष्ट कॅप त्यांच्या व्यक्तिमत्त्वातल्या तजेलदारपणाला आणखीनच उजाळा देणारी दिसे. वर्ष होतं २०१३.

गावातल्या नदीत, तळ्यात पोहणं, नौकाविहार करणं वेगळं आणि थेट लढाऊ जहाजांवर देशसेवा करायला मिळणं वेगळं. धर्मेंद्र्सिंग आणि समुद्राचं नातं फार लवकर जुळलं आणि अर्थातच लढाऊ जहाज हे त्यांचं दुसरं निवासस्थान बनलं.

त्यांना लाभलेलं पाण्यातलं निवासस्थान काही साधंसुधं नव्हतं. तब्बल बावीस मजली इमारतीएवढी उंची होती या घराची आणि वजन होतं ४४, ५०० टन. लांबी म्हणजे फुटबॉलच्या तीन मैदानं बसतील इतकी आणि रुंदी म्हणाल तर कित्येक लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स सहज मावतील एवढी. आणि नाव होतं आय. एन. एस. विक्रमादित्य! भारताची  सर्वांत शक्तिशाली, आधुनिक युद्धनौका. रशियाकडून खरेदी केली गेलेली ही युद्ध नौका सरतेशेवटी अतिशय सुसज्ज होऊन २०१४ मध्ये भारतीय नौदलात प्रवेश करती झाली आणि तिने शत्रूच्या काळजात धडकी भरवली.

युद्धनौकेवर अतिशय उच्च दर्जाचं प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक असतं. विक्रमादित्य वर जवळ जवळ सव्वाशे अधिकारी आणि पंधराशे नौसैनिक कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यास सदैव सज्ज असतात. धर्मेंद्र सिंग साहेबांनी एका नौसैनिकाला अत्यावश्यक असलेली सर्व कौशल्ये अल्पावधीत शिकून घेतली. आण्विक, जैविक आणि रासायनिक युद्धासाठी आवश्यक कौशल्ये शिकण्यात तर त्यांनी उच्च दर्जा प्राप्त केला होता. अग्निप्रतिबंध या विषयात तर त्यांना खूप गती होती.

आय. एन. एस. अर्थात इंडियन नेवल शिप ‘विक्रमादित्य एप्रिल २०१९ मध्ये मित्रराष्ट्रांच्या सोबत मोठ्या युद्धसरावात सहभागी होणार होतं. यासाठी खूप मोठी तयारीही केली जात होती.

महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या करुणा यांचं स्थळ धर्मेंद्र सिंग साहेबांना सांगून आलं होतं. वयाची तिशी आली होती आणि विवाह योग जुळून आला होता. नौसैनिकांना खूप मोठ्या कालावधीसाठी जहाजांवर वास्तव्य करावं लागतं. युद्धनौका म्हणजे एक तरंगतं शहरच जणू. इथं राहण्यासाठी खूप मजबूत मन:शक्ती आणि संयम आवश्यक असतो.

आपलं आवडतं जहाज सरावात सहभागी असणार आणि आपण त्यावर नसू याविचाराने धर्मेंद्र सिंग साहेबांनी आपल्या विवाहानंतर काही तासांतच समुद्राची वाट धरली. विवाहात अग्निला साक्षीला ठेवून त्यांनी सात प्रदक्षिणा घालतानाही त्यांच्या मनात आपलं कर्तव्य असावं. आणि योगायोगानं विक्रमादित्यवरही त्यांना अशीच एक जीवघेणी अग्नि-प्रदक्षिणा घालावी लागेल, असं कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं.

विक्रमादित्य कर्नाटकातील कारवार बंदरात प्रवेश करण्याच्या अगदी बेतात असताना नौकेच्या इंजिनरूम मध्ये आग भडकल्याचं समजलं. नौकेवरची अग्निशमन यंत्रणा सज्ज होतीच आणि नौसैनिक सुद्धा. लेफ्टनंट कमांडर पदावर पोहोचलेले धर्मेंद्रसिंग चौहान साहेब या अग्निशमन मोहिमेचे धडाडीने नेतृत्व करीत होते. या कामात त्यांना उत्तम गती होती. भारताची एवढी मोठी दौलत, सोळाशेच्या वर नौसैनिकांचे भवितव्य पाण्यात लागलेल्या त्या अग्नितांडवात रसातळाला जाण्याची शक्यता नाकारता येणार नव्हती.

धर्मेंद्रसिंग साहेब मोठ्या त्वेषाने धुराने भरलेल्या कक्षामध्ये शिरले. त्यांचा आवेश पाहून इतर नौसैनिकांनाही स्फुरण चढले. आगीवर नियंत्रण मिळण्याची चिन्हे अगदी दृष्टीपथात होती. इतक्यात एक वाफेचा पाईप अचानक फुटला आणि त्यातील अतिशय उष्ण वाफ धर्मेंद्रसिंग साहेबांच्या अंगावर आली आणि ते होरपळून निघाले. नाका-तोंडात आधीच विषारी धूर गेला होताच. समोरचं काही दिसत नव्हतं. पण साहेब मागे हटले नाहीत….. शुद्ध हरपेपर्यंत ते आगीशी सामना करीत राहिले. युद्ध काही मैदानातच लढली जातात असं नव्हे. देशाची संपत्ती जतन करण्यासाठी केलेला संघर्षही युद्धापेक्षा कमी नसतो.

लेफ्टनंट कमांडर धर्मेंद्रसिंग चौहान साहेबांनी विक्रमादित्य आणि त्यावरील सोळाशे सैनिकांचं त्यादिवशी मृत्यूपासून संरक्षण केलं होतं स्वत: अग्निसाक्षी राहून. परिस्थिती नियंत्रणात येताच साहेबांना त्वरीत जवळच्या रुग्णालयात एअरलिफ्ट करून पोहोचवण्यात आलं…. पण अग्निनं डाव साधला होता! चाळीसेक दिवसांपूर्वी विवाहवेदीवर चढलेला तीस वर्षे वयाचा एक उमदा नौसेना अधिकारी आता मृत्यूच्या वेदीवर पहुडला होता. नववधूच्या हातांवरील मेहंदी अजून फिकी पडलेली नव्हती…. मात्र तिच्या सुखी संसाराची नौका मृत्यू नावाच्या खडकावर आदळून अगदी गर्तेत गेली होती… कायमची. आईच्या हृदयचा तर विचार करूनही थरकाप उडावा. मोठ्या सन्मानानं शहीद धर्मेंद्रसिंग साहेबांना रतलामवासियांना अंतिम निरोप दिला. पण भारतीय सैनिकांच्या कुटुंबियांच्या धीरोदात्तपणाची कमाल पहा… काहीच दिवसांत धर्मेंद्र्सिंग साहेबांच्या पत्नीने सैन्यात भरती होण्याची पात्रता पार केली. नौसेनेचा सफेद गणवेश अंगावर परिधान करून प्राणांची बाजी लावलेल्या आपल्या पतील पायदळाचा ऑलिव्ह ग्रीन गणवेश मिळवून श्रीमती करूणा सिंग एक अनोखी भेट देण्यास सज्ज झाल्या. यासाठी झालेल्या मुलाखतीत त्यांनी प्रथम क्रमांकाने बाजी मारली. आणि त्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू झाल्या! सलाम करूणा सिंग मॅडमच्या जिद्दीला. उण्यापु-या पंधरवड्याचा त्यांचा आणि धर्मेंद्रसिंग साहेबांचा सहवास…. पेशाने प्राध्यापिका असलेल्या एका नाजूक तरूणीस थेट सैनिकाचं काळीज देऊन गेला. शहीद सैनिक असेच आपल्या आठवणींतून, कर्तृत्वातून जगाच्या स्मरणपटावर आपली पावलं ठळक उमटवून जातात. यांच्या ऋणातून उतराई होणं कठीण पण त्यांचे स्मरण करणं सहजी शक्य. जयहिंद! जय हिंद की सेना.

शहीद लेफ़्टनंट कमांडर धर्मेंद्र्सिंग चौहान साहेबांना शतश: नमन.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares