मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “प्रेमाचं वय” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “प्रेमाचं वय” ☆ श्री मंगेश मधुकर 

रविवारची संध्याकाळ मला नेहमीच अस्वस्थ करते. उगीचच उदास वाटतं. आजसुद्धा परिस्थिती वेगळी नव्हती. टीव्हीत मन रमलं नाही. मोबईलचा कंटाळा आला. काय करावं सुचत नव्हतं. एकदम ब्लॅंक झालो. टेरेसवर जाण्याची लहर आली. सौंना आश्चर्य वाटलं. तसंही बऱ्याच महिन्यात गेलो नव्हतो. दोन मजले चढून टेरेसवर आलो. आजूबाजूला नव्या-जुन्या बिल्डिंग्जची गर्दीच गर्दी वायरचं पसरलेलं जाळं त्यावर बसलेले कावळे, कबुतरं नेहमीपेक्षा वेगळ्या गोष्टी पाहून जरा बरं वाटलं. टेरेसवर शांतता होती. कोणी डिस्टर्ब करायला नको म्हणून सहज दिसणार नाही अशी जागा पाहून बसलो. बेचैनी कमी झाली तरी मनात वेगवेगळे विचार सुरूच होते. इतक्यात बारीक आवाजात बोलण्याचा आवाज आला.

“ए, काल संध्याकाळी काय झालं.”

“काही नाही”

“बोल की, येस की नो”

“अजून मी फायनल सांगितलं नाही.”

“लवकर सांग. आधीच उशीर झालाय.”

“तुलाच जास्त घाई झालेली दिसतेय”.

“उगाच भाव खाऊ नकोस. मी मधे नसते तर काहीच झालं नसतं”

“फुकट केलं नाहीस. दोघांकडून गिफ्ट घेतलय. तेव्हा जास्त उडू नकोस.”

“ओ हो!!बॉयफ्रेंड काय मिळाला लगेच बेस्ट फ्रेंड उडायला लागली.”

“मार खाशील. गप बस. ममीचा मोबाईल आणलाय. तिला कळायच्या आत त्याच्याशी बोलू दे”

“लवकर फोन लाव. स्पीकरवर टाक”

“गावजेवण नाहीये. कुणी ऐकलं तर.. कान इकडं कर. दोघी मिळून ऐकू”नंतर फक्त दबक्या आवाजात बोलण्याचा आणि हसण्याचा आवाज येत होता. फोन बंद झाल्यावर पुन्हा नॉर्मल बोलणं सुरू झालं.

“आता पार्टी पाहिजे”

“कशाबद्दल”

“बॉयफ्रेंड मिळाला”

“तो तर मिळणारच होता. बघितलं ना कसला पागल झालाय. नुसता बघत रहायचा.”

“हा तू तर ब्युटी क्वीनच ना”

“जळतेस का?”

“माझा ही आहेच की.. ”

“तोंड पाहिलं का?ज्याच्यावर मरतेस तो तर बघत पण नाही आणि तू उगाच…”

“माझं मी बघेन. जास्त शायनिंग मारू नकोस. बॉयफ्रेंड टेंपररी पण मैत्री परमनंट आहे. लक्षात ठेव.”

“ए गपयं. सेंटी मारू नको.”

“अजून काय म्हणाला सांग ना”

“तुला कशाला सांगू. आमचं सिक्रेट आहे”

“ते फोडायला एक मिनिट लागणार नाही. आता सांगतेस की…”

“तो फार अडव्हान्स आहे”

“असं काय केलं”

“करायला अजून नीट भेटलोय कुठं?”

“मग नुसती पोपटपंची”

“ती सुद्धा जाम एक्सयटिंग आणि अंगावर काटा आणणारी”

“मामला अंगापर्यंत पोचला. लकी आहेस”

“सालं, माझ्याकडे मोबाईल नाही त्यामुळे सगळा लोचा होतो. आमचं नीट बोलणं होत नाही.”

“त्यालाच सांग की घेऊन द्यायला”

“त्याच्याकडे आईचा जुना फोन आहे. मागितला तर आधी किस दे म्हणाला”

“अय्यो.. ”खी खी हसण्याचा आवाज आला. तितक्यात खालच्या मजल्यावरून जोरजोरात हाका सुरू झाल्या तेव्हा घाबरून ताडकन उभ्या राहीलेल्या दोघी स्पष्ट दिसल्या पण त्यांना मी दिसलो नाही. दोघी धावत खाली गेल्या. टेरेसवर मी एकटाच होतो. खरं सांगायचं तर मुलींचं इतकं ‘बोल्ड’ बोलणं माझ्यासारख्या मध्यमवर्गीयाला पचनी पडलं नाही. नवीन पिढी खूप फास्ट आहे याची कल्पना होती तरीही एवढी फास्ट असेल असं वाटलं नाही. जे ऐकलं त्यावर विश्वास बसत नव्हता कारण एक सहावीत शिकणारी अन दुसरी सातवीत.

 नकळत नव्वदच्या दशकातले शाळेतले दिवस आठवले अन हसायला आलं. ते लहानपण म्हणजे मित्र, मित्र आणि मित्र यापलीकडे काही नव्हतं. भरपूर खेळायचं अन अधे-मधे अभ्यास असं चालायचं. ‘प्रेम’ वगैरे गोष्टींची जाणीव नववीत गेल्यावर व्हायची. एखादी आवडायची मग स्वप्नं गुलाबी व्हायची. तिच्यावरून चिडवणं, त्यावर मित्रांमध्ये नुसत्याच चर्चा. कृती काही नाही. लपून छ्पून बघणं चालायचं. खूप इच्छा असूनही बोलायची हिंमत नव्हती. मुलींशी बोलताना भीती वाटायची. तिथं प्रेम व्यक्त करणं तर फार लांबची गोष्ट. त्यावेळची परिस्थितीच वेगळी होती. वडीलधारे, शिक्षकांचा धाक, दरारा होता. मार पडेल याची भीती वाटायची. आता मात्र सगळंच खूप सोपं आणि सहज झालंय.” अशा विचारांची लागलेली तंद्री सौंच्या आवाजानं तुटली.

“काय झालं”तिनं विचारलं. तेव्हा नुकताच घडलेला प्रसंग सांगितला.

“मग यात विशेष काही नाही हा वणवा सगळीकडेच पेटलाय. घर घर की कहानी. थॅंक्स टू मोबाईल आणि इंटरनेट.”

“मुलं अकाली प्रौढ होतायेत हे चांगलं नाही.” 

“कारट्यांना, अजून धड नाक पुसता येत नाही अन प्रेम करतायेत”सौं हसत म्हणाली.

“हे सगळं उथळ, वरवरचं आहे. काळजी वाटते.”

“कसली”

“हे सगळं कुठं जाईल??आणि बालपणीचा निरागसपणा कुठंयं ?

“तो तर केव्हाच संपला. आता मुलांचं भावविश्व बदललयं. बॉयफ्रेंड/गर्ल फ्रेंड असणं हे प्रेस्टीज मानलं जातं. त्यासाठी वयाची अट नाही. याविषयी प्राउड फील करणारेही आजूबाजूला आहेत. आता बालपण लवकर संपतं कारण…”

“ प्रेमाचं वय् अलिकडं आलंय” 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “शांतीनिकेतन” ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ “शांतीनिकेतन” ☆ श्री सुनील शिरवाडकर

शिक्षण क्षेत्रात आपण काहीतरी करावे असे रविंद्रनाथ टागोरांना नेमके केव्हा वाटु लागले? का वाटु लागले?तो काळ इंग्रजीच्या शिक्षणाला अवास्तव महत्त्व देणारा होता. अगदी आजच्या सारखाच. इंग्रजी भाषा आली की आपल्याला सर्व काही आलेच..असे मानणार्या बुध्दिजीवी वर्गाचा.

बंगालमधील शहरी समाजात बंगाली भाषेविषयी एक प्रकारची तिरस्काराची भावना निर्माण झाली होती. दुरगावी गेलेल्या मुलांना पत्र लिहायचे म्हटले तरी वडील ते मात्रुभाषेतुन न लिहीता इंग्रजीत लिहीत.

त्या काळात कॉंग्रेसचे अखिल भारतीय अधिवेशन बंगालमध्ये झाले होते. त्यावेळी रविंद्रनाथांनी भाषण केले ते बंगालीत.तत्कालीन राष्ट्रप्रेमींनी त्यांच्यावर त्याबद्दल टीकाही केली होती.. चेष्टाहि केली. साधारण त्याच काळात रविंद्रनाथांनी ठरवले की, या भाषेच्या गुलामगिरीतून सुटण्यासाठी आपण काहीतरी करावयास हवे. आपली सगळी बुद्धी, प्रतिभा या कामासाठीच वापरण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

सर्व शहरी सुखसोयींचा,सुविधांचा त्याग करून आपल्या कुटुंबासह ते बाहेर पडले. फार पूर्वी म्हणजे जेव्हा रविंद्रनाथ ११-१२ वर्षाचे होते.. तेव्हा त्यांच्या वडिलांसह ते वीरभुम मध्ये आले होते. या जागेपासून जवळच एका दरोडेखोरांची वस्ती होती. तेथील निवांतपणा.. निसर्गाचे वैभव मनात साठवत त्यांचे वडील देवेंद्रनाथ तेथे ध्यान लावून बसत.तेथील दरोडेखोरांच्या मनात त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले. ते पण जवळ येऊन बसत.त्यातील कित्येकांनी वाटमारीचा व्यवसाय सोडला. देवेंद्रनाथांना आपल्या व्यथा, अडचणी सांगत. 

आणि आता रविंद्रनाथ पुन्हा त्या माळावर आले .त्यांना जाणीव झाली.. हिच..होय हिच जागा योग्य आहे. आत्मचिंतन करण्यासाठी.. ध्यान करण्यासाठी. त्यांनी तो माळ विकत घेतला.त्यावेळी एक लहान टुमदार बंगली बांधली. त्या सुंदर बंगल्याचेच नाव…’शांती निकेतन’.

१९०१ साली रविंद्रनाथांनी शांतीनिकेतनमध्ये प्रथमच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांच्या सोबतीला होती त्यांची पत्नी आणि दोन मुले. तेच त्यांचे पहिले विद्यार्थी. येथे मुलांना शिकवण्यासाठी पाठवणे म्हणजे सर्वसाधारण बंगाल्यांच्या द्रुष्टीने धाडसाचेच होते.

खुद्द इंग्रज या शाळेकडे संशयाने पाहत होते. भारतीयांमध्ये आपली भाषा..आपली संस्कृती याबद्दल अभिमान निर्माण करणे म्हणजे राजद्रोह होता. त्यामुळे रविंद्रनाथांनांकडे शिकवण्यासाठी मुले पाठवणे तर जाऊ द्या.. त्यांच्याशी संपर्क ठेवणे सुध्दा लोक टाळत होते. सरकारी नोकरीत असलेल्या उच्चवर्गीय बंगाल्यांनी आपली मुले शांतीनिकेतनमध्ये पाठवु नये असा गुप्त आदेशच इंग्रज सरकारने काढला होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत सुध्दा काहींनी आपली मुले रविंद्रनाथांनांच्या स्वाधीन केली होती.

कशी होती ही शांतिनिकेतन शाळा? ऋतुमानानुसार बदलणारी.. निसर्गाचे रुप..सौंदर्य मुलांना समजले पाहिजे म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक आश्रमपध्दती स्वीकारली होती. जीवनातील आनंदाची नानाविध क्षेत्रे मुलांना मोकळी करून द्यायला हवी. त्यासाठी त्यांनी त्या विस्तीर्ण माळरानावर तपोवनाची उभारणी केली. त्या मुक्त छत्राखाली नांदणारे ते छात्र..आणि त्यांना गौरवाची दिशा देणारे हे गुरु. गुरु शिष्यांनी एकत्र येऊन केलेली ती आनंद साधना होती. 

तत्कालीन ब्रिटीशांच्या शिक्षण पध्दतीपेक्षा सर्वार्थाने वेगळी ही शाळा होती.

रविंद्रनाथ म्हणतात.. मी स्वतः शाळेतून पळून आलेला मुलगा. शिकवावं कसं हे मला ठाऊक नव्हतं.मला मुलांनी जसं शिकावं असं वाटत होतं ,त्याला योग्य अशी पाठ्यपुस्तके देखील नव्हती. अभ्यासक्रमही नव्हता. शहरातल्या सुखसोयींपासुन दुर अशा शाळेत तर सुरुवातीला कोणी येतही नव्हते.

मग रविंद्रनाथ या मुलांना काय शिकवायचे? नृत्य.. गायन..कविता.. निसर्गाशी एकरूप होऊन रहावे.. मुसळधार पावसात त्या पर्जन्यधारांखाली चिंब भिजायला मुलांना उत्तेजन मिळत होते. आश्रमाजवळुन वाहणारी नदी पावसाळ्यात फुगुन वाहु लागली की गुरु आणि शिष्य बरोबरीनेच त्यात उड्या मारुन पोहोण्याचा आनंद लुटत.भूगोलाच्या पुस्तकातील ही हवा.. ते वारे..याचा आनंद वार्याबरोबर गात गात गाणी म्हणत लुटत.तो वारा पुस्तकाच्या पानापानातुन नव्हे तर मनामनातुन गुंजत राही.मुलांनी मुक्तपणे हे सर्व शिकावे हीच त्यांची खरी धडपड होती.

त्यांच्या मते दडपण आणि विकास या दोन गोष्टी एकत्र राहुच शकत नाही. त्यामुळे मुलांनी मुक्तपणे शिकावे यासाठी त्यांनी संगीताचा मार्ग निवडला. सर्व काही.. म्हणजेच कामे.. शिक्षण गात गात झाले तर त्यात असलेला रस टिकून राहील हे त्यांना जाणवले. निरनिराळे सण..उत्सव.. जत्रा यातून भारतीय संस्कृती टिकून आहे हे त्यांना माहित होते. त्यांनी शांतीनिकेतनमध्ये पौष जत्रा भरवण्यास सुरुवात केली. निसर्गाशी नाते जोडण्यासाठी मग छोटी छोटी रोपे पालखीत घालून त्यांची मिरवणूक काढण्यास सुरुवात केली. आणि त्यांच्या जोडीला सुंदर सुंदर गाणी. झाडांशी.. वेलींशी मुलांचे नाते जडण्यास सुरुवात झाली.

इथल्या वातावरणात साधेपणा होता. पण त्यात रुक्षपणा त्यांनी कधीही येऊ दिला नाही. प्रसन्नता.. सौंदर्य.. आनंद यापासुन विद्यार्थ्यांची ताटातूट कधी होऊ दिली नाही. शिक्षकांना पोटापुरते मिळत होते, पण मानसिक श्रीमंती खुपच मोठी होती. बाजारात मिळणाऱ्या छानशौकिच्या गोष्टींची, ऐश्वर्याची विद्यार्थ्यांनांच काय, पण शिक्षकांनाही कधी आठवण होत नव्हती. बंगाली विणकरांकडुन विणुन घेतलेली सुती वस्त्र रविंद्रनाथांपासुन सर्व जण वापरत.पण त्यात कलात्मकता कशी येईल याकडे लक्ष दिले जाई.

बाराखडींची,शब्दांची ओळख होण्यासाठी ‘सहजपाठ’ या नावाने त्यांनी इतक्या सुबोध शब्दात सुंदर सुंदर कविता रचल्या की गाता गाता मुलांना अक्षर ओळख होऊन जात असे. हे ‘सहजपाठ’ अजूनही बंगालमधील पाठ्यपुस्तकांत आजही आपले स्थान टिकवून आहे. बंगाली लोकांमध्ये असलेले कलेचे.. संगीताचे प्रेम वाढीस लागण्याचे खरे कारण म्हणजे हे ‘सहजपाठ’.

७ मे…. रविंद्रनाथांची  जयंती….  त्यानिमित्ताने त्यांना वाहिलेली ही एक आदरांजली !

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ १९४७ मधली गोष्ट – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ १९४७ मधली गोष्ट – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर

– डॉ. आर. एच. कुलकर्णी व कुटुंबीय 

डाॅ. आर्. एच्. कुलकर्णी नामक २२ वर्षाच्या तरूणाला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या चंदगढ़ गावी दवाखान्यात नोकरी मिळाली. दवाखान्यात तुरळक पेशंटस् असायचे.

जुलै महिन्यात रात्री तुफान पाऊस पडत होता. आर्. एच्. के. चा दरवाजा कोणीतरी जोरजोराने वाजवत होतं.

बाहेर दोन गाड्या घोंगडी पांघरलेली, हातात लाठ्या -काठ्या घेतलेली सात – आठ माणसं उभी होती. काही कळायच्या आतच त्यांना गाडीत ढकलण्यात आलं. सुमारे दीडेक तासात गाडी थांबली. काळाकुट्ट अंधार! लाठीधार्‍यांनी डॉक्टरांना एका खोलीत ढकललं. खोलीत एक चिमणी मिणमिणत होती. खाटेवर एक तरुण मुलगी, बाजूला एक म्हातारी स्त्री बसली होती.

डाॅक्टरांना तिचं बाळंतपण करण्यासाठी फर्मावण्यात आलं. ती मुलगी म्हणाली, “डाॅक्टर, मला जगायचं नाही. माझे पिताजी खूप श्रीमंत जमीनदार आहेत. मुलगी असल्यामुळे मला शाळेत पाठवलं नाही. घरी शिकवायला एक शिक्षक ठेवला. मला या नरकात ढकलून तो पळून गेला. गावाच्या बाहेर या घरात या दाईबरोबर मला गुपचूप ठेवण्यात आलं.

त्या मुलीनं एका कन्येला जन्म दिला, पण बाळ रडलं नाही. ती म्हणाली, “मुलगीच आहे ना? मरू दे तिला. माझ्यासारखे भोग नशिबी येतील. ” कुलकर्णी डाॅक्टरांनी आपल्या ज्ञानाचा वापर करून बाळाला रडायला लावले. डाॅक्टर बाहेर येताच त्यांना १०० रु. देण्यात आले, त्या काळी ही रक्कम मोठी होती. आपलं सामान घेण्याच्या मिषानी डाॅक्टर खोलीत आले. त्या मुलीच्या हातावर शंभराची नोट ठेवत म्हणाले, “आक्का, आपल्या किंवा मुलीच्या जीवाचं बरं-वाईट करून घेऊ नको. संधी मिळेल तेव्हा पुण्याच्या नर्सिंग काॅलेजला जा, आपटे नावाच्या माझ्या मित्राला डाॅ. आर्. एच्. कुलकर्णीनी पाठवलंय सांग, ते तुला नक्की मदत करतील. भावाची विनंती समज. “

नंतर आर्. एच्. नी स्त्री-प्रसूतीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले. अनेक वर्षांनंतर औरंगाबादला एका काँन्फरन्स्ला गेले असता अत्यंत उत्साही आणि तडफदार अशा डाॅ. चंद्राच्या भाषणानी खूप प्रभावित झाले.

डाॅक्टर चंद्राशी बोलत असताना कोणीतरी त्यांना हाक मारली. डाॅ. आर्. एच्. कुलकर्णी असं ऐकताच चंद्रानं चमकून पाह्यलं. “सर, तुम्ही कधी चंदगढ़ला होतात?”

“हो, पण बरीच वर्ष झाली या गोष्टीला… “

“तर मग तुम्हाला माझ्या घरी यावंच लागेल. “

“चंद्रा, मी तुला आज पहिल्यांदा बघतोय, तुझं भाषण खूप आवडलं म्हणून तुझं कौतुक करायला भेटलो. असं घरी यायचं म्हणजे……. “

“सर प्लीज…. “

“आई बघितलंस का कोण आलंय?”

चंद्राच्या आईने डाॅक्टरांचे पायच धरले.

“तुमच्या सांगण्यावरून मी पुण्याला गेले, स्टाफ नर्स झाले. माझ्या मुलीला मी खूप शिकवलं, तुमचा आदर्श ठेवून स्त्री विशेषज्ञ डाॅक्टर बनवलं. “

“कुठंय ती मुलगी?”

चंद्रा चटकन पुढे झाली.

आता आश्चर्यचकित व्हायची वेळ डाॅक्टरांची होती.

“चंद्रा, तू मला कसं ओळखलंस?”

“तुमच्या नावामुळे. सतत जप चाललेला असतो आईचा… “

“तुमचं नाव रामचंद्र म्हणून हिचं नाव ‘चंद्रा’ ठेवलं. तुम्हीच आम्हाला जीवदान दिलंय. चंद्रा गरीब स्त्रियांना निःशुल्क तपासते, तुमचा आदर्श ठेवून… “

डाॅ. आर्. एच्. कुलकर्णी म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या, सुप्रसिद्ध लेखिका, इन्फोसिसच्या सुधा मूर्तींचे वडील…!!!

प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नेसा –बांधा – घाला – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? वाचताना वेचलेले ?

नेसा –बांधा – घाला – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

वेगवेगळ्या कपड्यांसाठी मराठीत वेगवेगळी क्रियापदं आहेत. हीच खरी भाषेची श्रीमंती. पण नवख्या माणसाची त्याने थोडी अडचण होऊ शकते. कोणत्या कपड्याला कोणतं क्रियापद हे लक्षात राहत नाही आणि मग त्यातूनच साडी घालणे वगैरे गोंधळ होतात.

एक युक्ती सांगते. ती लक्षात ठेवा. म्हणजे हे असे गोंधळ टळतील. कोणती ती युक्ती ? पाहू.

एक लक्षात ठेवा. शिवलेलाच कपडा घालायचा. म्हणून लेंगा, सदरा, टोपी, पगडी, हाप्पँट या सगळ्या गोष्टी घालायच्या. पण बिनशिवलेला कपडा चुकूनसुद्धा घालायचा नाही. म्हणून साडी, धोतर वगैरे घालणं शक्य नाही.

असा बिनशिवलेला कपडा जर कंबरेखाली परिधान करणार असू तर तो नेसायचा. म्हणून धोतर, सोवळं, साडी, लुंगी नेसा.

हेच जर बिनशिवलेला कपडा कंबरेवर परिधान करणार असू तर तो घ्यायचा. म्हणून ओढणी, उपरणं घ्या. अगदी पदरसुद्धा घ्या.

आता जर अशा बिनशिवलेल्या कपड्याने सगळं अंग झाकणार असू तर तो पांघरायचा. म्हणून शेला, शाल पांघरा.

तोच बिनशिवलेला कपडा जर डोक्यावर परिधान करणार असू तर तो बांधायचा. म्हणून मुंडासं, पागोटं, फेटा बांधा.

आता याखेरीज काही अगदी वेगळी क्रियापदं काही मोजक्याच ठिकाणी वापरतात. तीदेखील पाहू.

म्हणजे मफलर गुंडाळतात. कधीकधी घाईघाईत साडीदेखील गुंडाळतात ! निऱ्या काढतात आणि खोचतात. कामाला सुरुवात करण्यापूर्वी पदर खोचतात. नऊवारी साडीचा किंवा धोतराचा काष्टा मारतात. असो.

हा लेख संपला आणि अनेकांच्या मनातला गोंधळ देखील ! आता बिनधास्त शर्ट अडकवा, पँट चढवा आणि कुठे बाहेर जायचं ते जा!

कवी : अज्ञात. 

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हाच चहा… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☕☕ हाच चहा ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

बालपणी फुगडी खेळताना, “चहा बाई चहा, गवती चहा, आम्हा मैत्रिणींची फुगडी पाहा” या गाण्याने झालेला चहाचा परिचय. ज्या वयात चहाची चवही माहीत नव्हती. पण गाण्यातून मात्र परिचय होता. त्या वेळी घरात स्टोव्ह वर चहा मोठ्या पातेल्यात ठेवला जायचा त्या काळी म्हणजे मी लहान असताना एकत्र कुटुंब पद्धती होती. एकत्र म्हणजे आई,वडील आणि मुलं नव्हे तर सगळे काका,त्यांची मुले असे मोठे कुटुंब असायचे. आत्या किंवा काकू चहा ठेवायची आणि चहाला बुडबुडे आलेत का? हे बघायला कोणीतरी सांगायचे. आणि ते छोटे मोठे कसे आलेत हे हात, गाल याच्या मदतीने सांगितले जायचे. आणि त्या हावभावा वरुन चहा किती उकळला आहे  ओळखायच्या. मग त्यात दूध घालून झाकण ठेवून थोडा वेळ मुरवायचा. मग दुसऱ्या पातेल्यात गाळून एकेकाला दिला जायचा.

असा चहाचा परिचय! पण प्यायला मात्र बंदी.चहा पिऊन काळी पडशील अशी भीती दाखवली जायची. अजूनही हे कळले नाही,चहा न पिता रंग मात्र चहा सारखा झाला कसा?

मोठे झाल्यावर कळले, इतक्या लहानपणी ज्याचा परिचय झाला तो चहा आपला नाहीच! कोणी एक शेन नुंग नामक चिनी शासक उकळते पाणी घेऊन झाडाखाली बसले होते.आणि अचानक झाडाचे पान त्यात पडले आणि त्या पाण्याचा रंग व चव बदलली हाच तो पहिला चहा. नंतर असेही वाचले, काही बौद्ध भिख्खू ध्यानाला बसताना विशिष्ठ झाडाची पाने खायचे, त्यामुळे त्यांना झोप येत नसे. हाच तो चहा व त्याची पाने. नंतर त्यात साखर,दूध घालून आपला चहा तयार झाला. आणि विविध नावांनी ओळखला जाऊ लागला. आसाम,दार्जिलिंग,निलगिरी अशी नावे घेऊन आला. पण आम्हाला हे काहीच माहिती नसायचे. आम्ही पुण्यातल्या जगप्रसिद्ध महाराष्ट्र टी डेपो समोर रांगेत उभे राहून फॅमिली मिक्सचर मिळाला की धन्यता मानणार. हाच आमचा चहा!

काही मंडळी तर अशी आहेत की त्यांना कोकिळच्या “कुहू कुहू” मध्ये सुध्दा “चहा चहा” ऐकू येते. आणि  “चहाला वेळ नसते,पण चहा वेळेवर लागतो”. “सवाष्णीने कुंकवाला आणि पुरुषाने चहाला नाही म्हणू नये”. अशी सुभाषिते सांगून केव्हाही चहा पिणारे चहाबाज आहेतच की. यांना केव्हाही चहा घेणार का? विचारले की उपकार केल्या प्रमाणे “घेऊ अर्धा” म्हणणारे पण असतातच. विशेष म्हणजे रात्री साडेआठ वाजता रोज चहा घेणारे आणि ती वेळ चुकली तर रात्री दहा वाजता घेऊन चहाशी प्रामाणिक राहणारी मंडळी पण आहेतच.

दिवसेंदिवस त्यात विविध पदार्थ मिक्स होऊन विविध उपयोगाचे ऋतू नुसार स्वरूप बदलणारे विविध चवीचे चहा तयार झाले. आणि आता तर फारच विविधता घेऊन विविध नावांनी चहा येत आहेत. ती नावे व त्या सोबत असलेली चित्रे, विविध नक्षी आणि त्या दुकानांची सजावट पाहून कोणालाही चहाचा मोह न होईल तरच नवल. आणि त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत याची पुरेपूर काळजी घेऊन चहाचे कप आकाराने लहान होत चालले आहेत. अगदी पोलिओ डोस घेतल्या प्रमाणे वाटते.

हे असे मसाला,

गवती,आले, विलायची

चहा घेता घेता एक दिवस

आईस टी समोर आला. आणि गरम, कडक चहाच्या कल्पनेला पुन्हा धक्का बसला. आणि आता तर आपली चहा पावडरच चहातून गायब झाली. आणि याला चहा कसे म्हणावे? हा माझ्या बाल बुध्दीला प्रश्न पडला. मग धाव घेतली गुगल बाबांच्या कडे! त्यांनी सांगितले चहा/टी म्हणजे कोणतीही पाने उकळली की झाला टी आणि आताचे टी बघून गरगरलेच! कारण काही चहा मध्ये पाने पण नाही तर चक्क फुले,बीया काहित झाडाच्या खोडाची साल असे वापरलेले असते.आणि नेहेमीचा रंग टाकून पिवळा,हिरवा,निळा असे इंद्रधनुष्यी रंग पण धारण केलेले चहा समोर येतात.

असे चहाचे अवतार बघता बघता आपल्या चहाचे अस्तित्व धोक्यात आले की काय अशी भीती वाटू लागली आहे. आणि मग चहा,पोहे कार्यक्रमात काय दिले जाणार? आणि चाय पे बुलाया है या ऐवजी कोणते पेय येणार? आणि हाच चहा कोणत्या स्वरूपात मिळणार? आणि चहाच्या टपरीवर गप्पा मारत काय प्यायचे? घरी आलेल्या पाहुण्यांना काय द्यायचे? गाडी चालवताना दर तासाला चहा घेऊन पुढचा प्रवास करणाऱ्यांचे कसे होणार?

असे बरेच प्रश्न मनात आहेत. पण सध्या तरी याची काळजी नाही. अजून तरी हाच चहा प्रचलित आहे. आणि चहाला भेटू या! हे आमंत्रण अजून तरी कायम आहे. तर चला आपणही एकेक चहा घेऊ या.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ जगात भारी…. आम्ही भिक्षेकरी…!!! – भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ जगात भारी…. आम्ही भिक्षेकरी…!!! – भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

(हो आम्ही टोमणे छातीवर घेऊन मिरवतो…. 🙂 – इथून पुढे 

तर; लक्ष्मी रोड / टिळक रोड किंवा इतर खरेदीच्या ठिकाणी आपले हे लोक गळ्यात आपण दिलेली हि पाटी अडकवून फिरतील आणि ज्यांच्या हातात प्लास्टिकची पिशवी आहे, अशा सर्वांना आपले हे लोक, आपली कापडी पिशवी त्यांना Get Well Soon म्हणत देतील…! (सिनेमा ने आपल्याला हा एक लय भारी शब्द दिला आहे)

जे आपले लोक रस्त्यावर अशा मोफत पिशव्या देतील, त्या प्रत्येकाला आपण एका पिशवी मागे पाच रुपये देणार आहोत,  म्हणजे एखाद्या व्यक्तीने शंभर पिशव्या वाटल्या तर त्यालाही पाचशे रुपये मिळतील… 

आपले लोक पिशव्या देतात की नाही….  

हे बघण्यासाठी मी आपल्या इतर 4 – 5 लोकांना (जे सध्या इमाने इतबारे भीक मागतात अशांना)  गुपचूप नजर ठेवण्यास सांगणार आहे…  त्यांनाही त्या बदल्यात दोन रुपये प्रति पिशवी देणार आहोत…. 

म्हणजे एखाद्याने शंभर पिशव्या दिल्या तर नजर ठेवणाऱ्या व्यक्तीला आपोआप दोनशे रुपये मिळतील…

ज्या माझ्या लोकांना आपण पिशव्या वाटायला देणार आहोत ते अत्यंत विश्वासू आहेत, त्यांच्यावर खरंतर कोणीही नजर ठेवण्याची गरज नाही…. 

पण, दारू पिणाऱ्या माणसाला दारूचे दुकान बघितलं की दारूची आठवण येते… तसंच भीक मागण्याच्या काही जागा फिक्स असतात, त्या जागी गेल्यानंतर भीक मागण्याची इच्छा आपोआप होते…. 

आणि म्हणून नजर ठेवण्याच्या निमित्ताने / बहाण्याने इतर चार-पाच जणांना भीक मागण्याच्या जागेतून  त्यांच्याही नकळत बाहेर काढता येईल. इथे आपण माणसाच्या स्वभावाचा वापर करून घेणार आहोत. 

आता बरेच लोक मला असे म्हणतील…. फुकट कशाला द्यायच्या आपल्या पिशव्या??? 

परंतु हि एक बिझनेस ट्रिक आहे, आधी फुकट द्यायचं…. सवय लावायची…. आणि त्यानंतर तीच गोष्ट दामदुपटीने विकायची… ! (अधिक माहितीसाठी मागील पाच वर्षातील स्वतःच्या घरातील वर्तमानपत्रे स्वतः चाळावीत, सर्वच माहिती देण्याचा आम्ही काही मक्ता घेतलेला नाही. ताजा कलम : पाच रुपये किलो हिशोबाने आपण वर्तमानपत्रे अगोदरच रद्दीत विकली असतील तर त्याला आम्ही जबाबदार नाही) 

बापरे… चुकून एक टोमणा मारला गेला की…. सवय हो सवय…. दुसरं काय…. ? 

तर, अनेक लोक स्वतःचे पोट भरण्यासाठी हि बिझनेस ट्रिक वापरतात…. आपण दुसऱ्याचे पोट भरण्यासाठी, दुसऱ्या एखाद्याला जगवण्यासाठी जर हि ट्रिक वापरली तर त्यात गैर काय…? 

विचार करा…. इतक्या साध्या गोष्टीमुळे किती कुटुंबं उभी राहतील ? रस्त्यावरचे  किती भिक्षेकरी कमी होतील ?? आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे प्लास्टिकचा वापर किती कमी होईल ??? 

पिशव्या शिवणारे, विकणारे आणि नजर ठेवणारे यांना यातून पैसे मिळतील हा एक भाग आहेच…  

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या सर्व गोष्टींमुळे भीक मागण्यापासून आपण त्यांना विचलित करणार आहोत… हे सर्व करत असताना, नुसते फिरायचे त्यांना पैसे मिळत असतील, भीक मागायच्या जागेवर जर ते थांबणार नसतील…. तर त्यांना भीक मागायची आठवण तरी राहील का…. ??? 

रडणाऱ्या लहान मुलाच्या हातात एखादं खेळणं देऊन त्याचं लक्ष विचलित करून त्याला शांत करणं… जगातल्या प्रत्येक आई आणि बापाने हेच आजवर केलं आहे…. 

(हल्ली रडणाऱ्या बाळाच्या हातात आई मोबाईल फोन देते तो भाग वेगळा, बाळ शांत झालं की मग कसं शांततेत फेसबुक, इन्स्टा वगैरे पाहता येतं 

असो, तीच संकल्पना आपण इथे राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. ! तेच साधं सोपं गणित वापरण्याचा इथे प्रयत्न आपण करत आहोत…. 

शिवाय फुकट देऊन सुद्धा, “चीत भी हमारी पट भी हमारी”…. !!! 

४.  यानंतर पुण्यातले मोठे मॉल, दुकानदार यांना मी स्वतः भेटेन…  हात जोडून त्यांना आपल्या पिशव्या विकत घ्यायची विनंती करेन. यातून जो पैसा मिळेल तो  पिशव्या शिवणाऱ्या, विकणाऱ्या आणि नजर ठेवणाऱ्या व्यक्तींना आपण परत करू. 

यानंतर मला माहित आहे…. 

आता आपला प्रश्न येईल, आम्ही यात काय मदत करू शकतो… ???

१. तर, पहिली गोष्ट म्हणजे प्लास्टिकची पिशवी वापरणे बंद करा माय बाप हो…..आणि स्वतःच्या घरातील कापडी पिशवी वापरा; नसेल तर आमच्याकडे मागा. आम्ही ती तुम्हाला पाठवू “चकटफू”…!!! 

२. एक फूट उंच, अर्धा फूट रुंद अशा आकाराच्या पिशव्या शिवता येतील असे कापड आपण आम्हाला देऊ शकता. उदा.जुनी ओढणी, जुनी साडी, मांजरपाटाचे किंवा तत्सम कापड इत्यादी…. (अंगडी टोपडी, फाटके बनियन, विरलेले रुमाल, तसेच घरात जुने शर्ट पॅन्ट पडलेच आहेत तर देऊन टाकू….  असे टाकाऊ कपडे इत्यादी गोष्टी देऊ नयेत… वितभर कपड्यापासून हातभर पिशवी तयार करायला आमचे पितामह काही स्वर्गातून ट्रेनिंग घेऊन आलेले नाहीत…  )

नाही म्हणता म्हणता, अजून एक टोमणा गेलाच की राव चुकून…. ! 

जाऊ द्या…. 

३. आपल्या परिसरातील दुकानदार / मॉल यांना आमच्या वतीने या पिशव्या कमीत कमी किंमतीत विकत घ्यायला विनंती करू शकता. यालाही ते तयार नसतील तर आम्ही त्यांना Get well soon म्हणत फुकट पिशव्या पाठवू…. 

प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि भिक्षेकर्‍यांचे लक्ष विचलित करणे हा आमचा मूळ हेतू आहे, यातून कोणताही व्यवसाय करण्याचा हेतू नाही…! 

४. माझ्याकडे जमा होत असलेल्या देणगीचा विचार करून मी सुरुवातीला साधारण दहा ते बारा लोकांना अशा प्रकारे काम देऊ शकतो. पण भीक मागणाऱ्या जास्तीत जास्त लोकांना यात सहभागी करून, त्यांना मानधन मिळावे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णतः बंद व्हावा…. हा प्रकल्प आणखी मोठ्या प्रमाणावर करता यावा…. यासाठी आपण आम्हाला ऐच्छिक देणगी देऊ शकता. 

17 एप्रिल माझा वाढदिवस… याच दिवशी श्रीराम नवमी होती…. याच दिवसाच्या मध्यरात्री मला हि संकल्पना सुचली…. योगायोग म्हणायचा की आणखी काही ? मलाही कळत नाही….! 

आपण कुणीही श्रीराम बनू शकत नाही…. पण आपल्या जवळ असणारे “भात्यातले बाण” आपण समाजासाठी “रामबाण” म्हणून तर नक्कीच वापरू शकतो… 

बघा पटतंय का… ??? 

माझ्या वाढदिवसा दिवशी मला सुचलेली ही संकल्पना… ! 

यामुळे थोड्या प्रमाणात का होईना, परंतु प्लास्टिकचा वापर कमी होईल, त्यामुळे निष्पाप प्राण्यांचे प्राण वाचू शकतील, अनेक सामाजिक आणि वैद्यकीय धोके थोड्या तरी प्रमाणात कमी होतील… माझे भीक मागणारे किमान दहा ते बारा लोक पहिल्या फटक्यातच भिकेतुन बाहेर पडतील… 

“भिक्षेकरी”  म्हणून नाही…. तर “कष्टकरी” होऊन; ‘गावकरी” म्हणून जगण्याकडे ते एक पाऊल टाकतील…! 

वाढदिवसाचं इतकं मोठं गिफ्ट या अगोदर मला कधीही मिळालं नव्हतं…!!! 

आयुष्यभर ऋणात राहीन मी या गिफ्टच्या….!!!

– समाप्त – 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चालचलाऊ भगवद्गीता आणि – कवी – ज. के. उपाध्ये ☆ माहिती संग्राहक व लेखक – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ चालचलाऊ भगवद्गीता आणि – कवी – ज. के. उपाध्ये ☆ माहिती संग्राहक व लेखक – श्री सुहास सोहोनी ☆

विसरशील खास मला दृष्टिआड होता …

कुणी काही म्हणा .. कुणी काही म्हणा …

रामचंद्र मनमोहन .. नेत्र भरून पाहीन काय …

त्यांच्याच पावलांचा .. हा नाद ओळखीचा …

अशी एकापेक्षा एक सरस भावगीते लिहिणाऱ्या कवीचं नांव तुम्हाला माहित असेलच … ज.के.उपाध्ये !

कवी – ज. के. उपाध्ये

(जन्म १८८३ आणि मृत्यु १९३७.)

काहीसं बेफिकिर, भरकटलेलं, मस्त कलंदर आयुष्य जगलेल्या या कवीच्या एका भावगीताला यशवंत देव यांच्या अतिशय आकर्षक चालीचं लेणं मिळून ते सुधा मल्होत्राच्या आवाजांत आकाशवाणीवरून प्रसारित झालं ते १९६०-६१ साली.  पण खऱ्या अर्थानं ते आमरसिकांपर्यंत पोहोचलं १९७६ मध्ये आशाबाईंची ध्वनिमुद्रिका आली तेव्हा. म्हणजेच कवीच्या मृत्यूनंतर ४० वर्षांनी. या भावगीतानं साऱ्या रसिक मनाला हेलावून टाकलं. हे गाणं होतं – “विसरशील खास मला दृष्टिआड होता !!”

नंतर त्यांच्या इतर गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका येतच राहिल्या. पण स्वतः कवीला मात्र आपल्या हयातीत आपले शब्द रसिकांपर्यंत पोचल्याचं भाग्य कधीच बघायला मिळालं नाही.

आईचं छत्र लहानपणीच हरवलेलं आणि वडील अतिशय तापट-संतापी! त्यामुळे लहानपणापासूनच फारशी माया, जिव्हाळा उपाध्ये यांच्या वाट्याला आला नाही. कदाचित त्यामुळेच उपाध्ये काहीसे एककल्ली, तऱ्हेवाईकही झाले होते.

१९०५ मध्ये विरक्ती आल्यामुळे, कुणालाही न सांगता, उपाध्ये अचानकपणे हनुमान गडावर गेले. तेथे त्यांनी दासबोधासह अनेक धार्मिक ग्रंथांची पारायणं केली.

१९०८ साली ते हनुमान गडावरून परत आले. विवाह झाला. कन्यारत्न घरी आले. पण दहा वर्षांतच पत्नीच्या आणि कन्येच्या मृत्यूमुळे, त्यांचे कौटुंबिक आयुष्य संपुष्टात आले. याच काळात त्यांच्या काव्यरचना आणि अन्य गद्य साहित्य यांच्या निर्मितीला सुरुवात झाली होती. १९२४ मध्ये “लोकमान्य चरितामृत खंड १” हा त्यांचा लो. टिळकांवरचा ओवीबद्ध ग्रंथ प्रकाशित झाला. पुढे “पोपटपंची” हा कवितासंग्रह. १९३२ साली उमर खय्यामच्या रुबायांचा मराठी अनुवाद प्रकाशित झाला. “वागीश्वरी” आणि “सावधान” या त्या काळच्या नियतकालिकांची जबाबदारी सुद्धा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली.

चालचलाऊ भगवद्गीता ” हे विडंबनात्मक काव्य लिहायला त्यांनी सुरुवात केली होती. पण ते खंडकाव्य काही ओव्या लिहिल्यानंतर अपूर्णच राहिलं असावं. याच काव्यावरूनच ज्येष्ठ विद्वान राम शेवाळकर यांनी उपाध्यांचा गौरव मराठी विडंबन काव्याचे आद्य उद्गाते अशा शब्दांत केला आहे.

“सावधान” हे त्यांचं नियतकालिक ऐन बहरांत असतांनाच, विषमज्वराच्या व्याधीनं १ सप्टेंबर १९३७ रोजी ज.के.उपाध्यांना मृत्यूच्या हवाली केलं.

मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेली अखेरची कविता म्हणजे :

एकटाची आलो आता

एकटाची जाणार

एकटेच जीवन गेले

मला मीच आधार ||

आपलं भाग्य असं की आपल्याला हा कवी त्याच्या कर्णमधुर भावगीतांमधून अनुभवायला मिळाला !

☆ चालचलाऊ भगवद्गीता : ज.के.उपाध्ये ☆

पार्थ म्हणे गा हृषीकेशी

या युद्धाची ऐशीतैशी

बेहत्तर आहे मेलो उपाशी

पण लढणार नाही  -१-

धोंड्यात जावो ही लढाई

आपल्या बाच्याने होणार नाही

समोर सारेच बेटे जावई

बाप, दादे, मामे, काके  -२-

काखे झोळी, हाती भोपळा

भीक मागूनि खाईन आपला

पण हा वाह्यातपणा कुठला

आपसात लठ्ठालठ्ठी  -३-

या बेट्यांना नाही उद्योग

जमले सारे सोळभोग

लेकांनो होऊनिया रोग

मरा ना कां  -४-

लढाई कां असते सोपी

मारे चालते कापाकापी

कित्येक लेकाचे संतापी

मुंडकीहि छाटती  -५-

कृष्ण म्हणे रे अर्जुना

हा कोठला बा बायलेपणा

पहिल्याने तर टणाटणा

उडत होतास  -६-

लढण्यासी रथावरी बैसला

शंखध्वनि काय केला

मग आताच कोठे गेला

जोर तुझा मघाचा?  -७-

तू बेट्या मूळचाच ढिला

पूर्वीपासून जाणतो तुला

परि आता तुझ्या बापाला

सोडणार नाही बच्चमजी  -८-

अहाहारे भागूबाई

आता म्हणे मी लढणार नाही

बांगड्या भरा की रडूबाई

बसा दळण दळत  -९-

कशास जमविले अपुले बाप

नसता बिचा-यांसी दिला ताप

घरी डाराडूर झोप

घेत पडले असते  -१०-

नव्हते पाहिले मैदान

तोवरी उगाच केली टुणटुण

म्हणे यँव करीन त्यँव करीन

आताच जिरली कशाने  -११-

अरे तू क्षत्रिय की धेड

आहे कां विकली कुळाची चाड?

लेका भीक मागावयाचे वेड

टाळक्यांत शिरले कोठुनी  -१२-

अर्जुन म्हणे गा हरी

आता कटकट पुरे करी

दहादा सांगितले तरी

हेका कां तुझा असला  -१३-

आपण काही लढणार नाही

पाप कोण शिरी घेई

ढिला म्हण की भागूबाई

दे नांव वाटेल ते  -१४-

ऐसे बोलोनि अर्जुन

दूर फेकूनि धनुष्य-बाण

खेटरावाणी तोंड करून

मटकन खाली बैसला  -१५-

इति श्री चालचलाऊ गीतायाम प्रथमोध्यायः

कवी – ज. के. उपाध्ये 

माहिती संग्राहक व लेखक : सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ जगात भारी…. आम्ही भिक्षेकरी…!!! – भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ जगात भारी…. आम्ही भिक्षेकरी…!!! – भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

“पुणेरी टोमणे मारूया… प्लास्टिकला पळवून लावूया… “

प्लास्टिकच्या वस्तू…. खास करून प्लास्टिकच्या पातळ पिशव्या यांचे विघटन होत नाही.

पुरातन काळात राक्षस नावाची संकल्पना होती, आजच्या काळात प्लास्टिकच्या पिशव्या हाच एक राक्षस आहे. विघटन न झाल्यामुळे पर्यावरणाला धोका… माणूस म्हणून आपल्यालाही अनेक वैद्यकीय – सामाजिक धोके…. आणि उकिरड्यात पडलेल्या पिशव्या निष्पाप मूक प्राण्यांच्या पोटात जातात आणि त्यांचे मृत्यू होतात.

गोहत्या थांबवण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न केले जातात; परंतु प्लास्टिक पिशव्या खाऊन ज्या गोमाता देवाघरी गेल्या, त्यांचा हिशोब कोणी ठेवला आहे का… ? 

हा विषय विविध स्तरावर सांगितला, तरी काही मूठभर लोक सोडुन इतरांना या विषयाशी काहीही घेणं देणं नाही… ! 

“भिक्षेकरी” हा असाच दुसरा ज्वलंत विषय…

भीक मागणारे मागतात आणि दोन पाच रुपये भीक देऊन, पुण्य मिळेल या भावनेने लोक भीक देतात…

… दोन पाच रुपयात पुण्य मिळतं ??? पुण्य इतकं स्वस्त असतं… ? 

अशा दोन पाच रुपये भीक देण्याने; देणारा, अप्रत्यक्षपणे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढवायला मदत करतो, भीक मागण्यासाठी आपली मुलं पळवली जातात, चांगल्या लोकांना धाक दाखवून भीक मागायला लावली जाते, यांची मुलं कधीही शाळेत जात नाहीत, मुलांचं अख्ख आयुष्य बरबाद होतं….

अजून सुद्धा खूप काही आहे… विषय मोठा आहे, तो मी माझ्या पुस्तकात सविस्तर मांडला आहे…

“भीक नका देऊ… एखाद्याला पायावर उभं राहण्यासाठी मदत करा… ” हे मी विविध स्तरावर जीव तोडून सांगितलं आहे, तरी आपल्यासारखे काही संवेदनशील लोक सोडुन इतरांना या विषयाशी काहीही घेणं देणं नाही… ! 

तर या दोन समस्यांची सांगड एकत्र कशी घालता येईल याचा विचार करत होतो… ! 

भीक मागणाऱ्या लोकांची खूप मोठी ताकद आज माझ्या मागे उभी आहे…. या सेनेचा सेनापती म्हणून कसा वापर करून घेऊ ? हा सतत विचार मी करत असतो….

रस्त्यात जाताना कितीतरी वेळा आपल्याला पाईपलाईन फुटलेली दिसते, आकाशाकडे हे पाणी उंच उसळी घेत असतं…. त्याचा फोर्स खूप जास्त असतो….. म्हणजे फुटून बाहेर पडणाऱ्या या पाण्याला सुद्धा आकाशात उंच भरारी घ्यायची आहे, त्याच्यात तितकी धम्मक आहे, परंतु योग्य वेळी योग्य साथ मिळत नाही… म्हणुन मग ते पाणी निपचितपणे गुपचूप जमिनीवर पडतं आणि शेवटी एखाद्या गटारात वाहत जातं… आणि मग गटारातलं पाणी म्हणून पुढे कधीही याचा उपयोग होत नाही…. ! 

हाच संबंध मी भीक मागणाऱ्या लोकांशीही जोडतो…

त्यांच्याकडे असणारी ताकद अशीच अफाट आहे… त्यांच्यातही खूप मोठा फोर्स आहे…. त्यांनाही आभाळात उंच भरारी घ्यायची आहे; परंतु योग्य वेळी योग्य ती साथ मिळत नाही… शेवटी थकून ते सुद्धा निपचितपणे गुपचूप जमिनीवर पडतात… पुढे एखाद्या गटारात सापडतात…. आणि मग “भिकारी”असं हिनवून, त्यांच्यावर शिक्का मारून, त्यांनाही कधीही माणसात आणलं जात नाही…. !

भीक मागणाऱ्या माझ्या लोकांमध्ये असलेल्या इतक्या मोठ्या ताकदीला, सेनापती म्हणून आवरण्यास… सांभाळण्यास… वळण लावण्यास… बऱ्याच वेळा मी कमी पडतो… बऱ्याच वेळा मला अपराधी वाटतं…. !

निसर्गाने या समाजाच्या देखभालीसाठी माझी निवड केली, परंतु मी खरंच तितका सक्षम आहे का ? या विचाराने काही वेळा मी खचून जातो…. ! 

खूप वेळा मी परिस्थिती समोर गुडघे टेकतो… खाली मान घालतो… पण खाली मान घालून सुद्धा विचारच करत असतो; की मला यांच्यासाठी अजून काय करता येईल ??? 

कित्येक लोक मला म्हणतात, ‘डॉक्टर, तुम्ही किती सुखी आहात… तुम्हाला किती सुखात झोप लागत असेल…. ‘

पण मला झोपच लागत नाही; ही वस्तुस्थिती आहे… अजून काय करता येईल ? काय करता येईल ??  काय करता येईल??? – हा इतकासा किडा रोज रात्री मला चावत असतो… मग माझी झोप उडून जाते, मी घड्याळाकडे कुस बदलत येड्यासारखा पहात राहतो…. बारा वाजतात, मग दोन वाजतात, चार वाजतात, पुढे  सहा सुद्धा वाजतात… घड्याळाचा काटा शांतपणे फिरतच असतो… तो मला चिडवत असतो… आणि हे कमी म्हणून की काय अलार्म वाजतो…. उठ रे बाबा…. ! 

उठायला मी झोपलोच कुठे आहे मित्रा…. ? पण कोणाला सांगू ? 

रात्रीच्या त्या अंधारात आम्ही दोघेच जागे असतो….

एक तो घड्याळाचा काटा आणि दुसरे माझे विचार… ! 

तो शांतपणे फिरत असतो…. आणि मी  सैरभैर… !

याच सैरभैर विचार मंथनातून, एक संकल्पना माझ्या डोक्यात परवा मध्यरात्री जन्माला आली…

मला नाही वाटत, या अगोदर संपूर्ण जगामध्ये अशी काही संकल्पना राबवली गेली असेल… !

संकल्पना सांगतो थांबा…. त्या अगोदर थोडी पार्श्वभूमी सांगावी लागेल….

मी मूळचा साताऱ्याचा, परंतु आख्ख आयुष्य पुण्यात गेलं… मग वाण नाही तर गुण लागणारच की…. ! 

माझ्या या पुण्यानं मला खूप काही दिलं…. त्याबरोबर टोमणे मारायला सुद्धा मला शिकवलं…

त्या अर्थाने “पुणेरी माणूस” माझा गुरु आहे… ! 

म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी माझ्या घरात बसून एक फूल, सर्व अस्सल पुणेरी माणसांना नेहमीच समर्पित करतो… (हो एकच फूल मिळेल… आमच्या बागेतली सर्व फुलं तुम्हाला वहायला, आम्ही काय कुठचे जहागीरदार नाही किंवा कुठल्या संस्थानचे संस्थानिक सुद्धा नाही… शिवाय तुम्ही काय आमचे जावई नाहीत किंवा व्याही सुद्धा नाहीत… तेंव्हा एक फूल घ्यायचं तर मानानं घ्या, नाहीतर तेही आम्ही परत काढून घेऊ… )

तर हा असा आहे पुणेरी टोमण्यांचा झटका… ! 

टोचत नाही…. बोचत नाही…. पण विषय हृदयापर्यंत भिडतो थेट…. !!! 

आता वर जाऊन कंसातील वरील वाक्य परत वाचा…. वाचताना मनातल्या मनात नाकातून वाचावे, म्हणजे “कोंकणी” हापूस आंब्याचा खरा स्वाद येईल….

ओके… वर जाऊन, नाकातून वाचून…. परत खाली आला असाल, तर आता संकल्पना सांगतो…

ती मात्र नाकातून वाचायची नाही…

१. तर, अशाच पुणेरी टोमण्यांचा वापर करून मी काही बोर्ड तयार करणार आहे…. ! 

“प्लास्टिक पिशव्या वापरणे सोडून द्या आणि कापडी पिशव्या आमच्याकडून घ्या…. किंमत तुम्ही ठरवाल ती…. ” अशा अर्थाचे बोर्ड तयार करून घेणार आहे, अर्थात पुणेरी स्टाईलनेच, टोमण्यांच्या स्वादासह…. ! 

२. पूर्वी भीक मागणाऱ्या लोकांना आपण नवीन शिलाई मशीन घेऊन दिली आहे अशा, सुरुवातीला किमान चार लोकांना पिशव्या शिवायला लावायच्या. त्यांना पिशव्या शिवता येईल अशा प्रकारचे कापड आपणच द्यायचे, एक पिशवी शिवल्यानंतर त्याचे पाच रुपये त्यांना द्यायचे. (दिवसातून शंभर पिशव्या त्यांनी शिवल्या तर त्यांना पाचशे रुपये मिळतील)

३. शिवलेल्या पिशव्या यानंतर पाच ते सहा भीक मागणाऱ्या इतर लोकांना देऊन; तयार केलेल्या  “पुणेरी टोमण्यांच्या पाट्या” त्यांच्या गळ्यात आणि पाठीवर अडकवायच्या….

हो – आम्ही टोमणे छातीवर घेऊन मिरवतो…. :-

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पठाण, गुलाम आणि सम्राज्ञी… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ पठाण, गुलाम आणि सम्राज्ञी… ☆ श्री संभाजी बबन गायके 

चित्रपट संगीत श्रोत्यांच्या डोईवरचं ‘पठाणी’ कर्ज आणि आपल्याला स्वर‘सम्राज्ञी’ देणारा ‘गुलाम’!

संगीतातील ताल स्वरगंगेच्या प्रवाहावर स्वार होऊन स्वत:ला व्यक्त करीत राहतो. जाणकार म्हणतात की, ताल म्हणजे काल, मार्ग, क्रिया, अंग, ग्रह, जाती, कला, लय, यती व प्रस्तार अशा दहा प्राणांनी व्याप्तमान ठेका होय. आपल्या भारतीय शास्त्रीय संगीत मूळ बारा स्वरांच्या अंगाखांद्यावर क्रीडा करीत असते. परंतू प्रत्यक्षात आपल्या कर्णपटलांना अलगद स्पर्शून जाणिवेच्या पृष्ठभागास श्रवणाची अनुभूती देणारे नाद एकूण बावीस आहेत, असं म्हणतात. सर्वपरिचित सारेगमपधनी हे सप्तशुद्ध आणि रे, ग, ध, नी हे कोमल स्वर आणि तीव्र स्वर म्हणजे म! पण या द्वादश-स्वरांच्या अंतरंगात आणखी खोलवर बारा स्वरकमलं असतात. स्वरांच्या या खोल डोहात सहजी ठाव घेऊन पुन्हा श्वास राखून गाण्याच्या पृष्ठभागावर येणं फक्त एकाच मानवी कंठाला शक्य झालं… तो कंठ म्हणजे लता मंगेशकर यांचा कोकिळकंठ! लता शब्द उलट्या क्रमानं म्हणला तर ताल बनून सामोरा येतो !

हा ताल आणि ही स्वरलता रसिकांच्या हृदयउपवनातील एखाद्या डेरेदार वृक्षाला कवेत घेऊन आभाळापर्यंत पोहोचली असतीच केव्हा न केव्हा तरी. जसे कृष्णपरमात्मा धर्मसंस्थापनार्थाय कुणाच्या न कुणाच्या पोटी जन्मायचेच होते….. देवकी निमित्त्त झाल्या आणि यशोदा पालनकर्त्या !

विपरीत कौटुंबिक परिस्थितीमुळे लतादीदींना मुंबईत येणं भाग पडलं. आणि मनाविरुद्ध अभिनय करावा लागला. मनात गाणं असतानाही पोटातलं भुकेचं गाणं वरच्या पट्टीतलं होतं… त्यामुळे वीजेच्या प्रखर दिव्यांसमोर उभं राहून खोटं खोटं हसावं लागलं, रडावं लागलं आणि दुस-यांच्या स्वरांवर ओठ हलवत गावंही लागलं. पण हे सुद्धा मागे पडलं. रोजगारासाठी काहीतरी करणं भाग होतं आणि एकेदिवशी एका स्नेह्यांच्या पुढाकारानं गाण्याची संधी मिळाली. वसंत जोगळेकरांच्या ‘आप की सेवा में’ या हिंदी चित्रपटात दीदींना ‘पा लागू… कर जोरी…. कान्हा मो से ना खेलो होरी’ गायलं. हे त्यांचं पहिलं ध्वनिमुद्रीत हिंदी चित्रपट गीत. , वर्ष होतं १९४६. बडी मां या चित्रपटातही एक गाणं मिळालं होतं ‘मां तेरे चरनों में’! आणि पुढे सुभद्रा या चित्रपटातही एक भजन मिळालं होतं. पण या कामगिरीचा प्रभाव त्यावेळच्या हिंदी चित्रपट सृष्टीवर फारसा पडला नव्हता.. लता नक्षत्र अजून ठळकपणे उदयास यायला अवकाश होता. पुढे ज्या लव इज ब्लाईंड या हिंदी चित्रपटासाठी गाणी गायली तो चित्रपटच पूर्ण होऊ शकला नाही. हा इंग्लिश नावाचा हिंदी चित्रपट कायमचे डोळे मिटून बसला. त्यामुळे या चित्रपटासाठी ध्वनिमुद्रीत झालेली गाणी मूक झाली. पण याच वेळी एका पठाणाच्या कानांनी हा आवाज मनात साठवून ठेवला. या पठाणाच्या मूळ नावाचा शोध काही केल्या लागत नाही. खरं तर चित्रपटांसाठी मामुली भूमिका करणारे लोक (एक्स्ट्रा कलाकार) निर्मात्यांना पुरवणारा हा माणूस. पण त्याला संगीताचा कान असावा, हे विशेष आणि आपल्यासाठी आनंददायी ठरले. या माणसाने मास्टर गुलाम हैदर अली यांच्याकडे त्यावेळी केवळ अठरा वर्षे वय असलेल्या या कोवळ्या आवाजाची महती गायिली. गुलाम हैदर हे पाकिस्तानातून भारतात आले होते तेच मूळी संगीतकार म्हणून कारकीर्द करायला. आणि संगीत दिग्दर्शक म्हणून तर ते अतिशय उजवे होतेच. परंतू यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे नव्या आवाजांना संधी देणे. शमशाद बेगम, सुधा मल्होत्रा, सुरींदर कौर या गायिका मास्टर गुलाम हैदर यांनीच रसिकांसमोर आणल्या. आता त्यांच्या हातून एक अलौकिक रत्न चित्रपट-संगीत क्षेत्राला सोपवले जाणार होते…. लता मंगेशकर!

मास्टरजींनी लतादीदींना भेटीस बोलावण्याचा निरोप याच पठाण दादाच्या हाती धाडला. दीदींना त्यांना त्यांचेच एक गाणे ऐकवले… त्यांनी आणखी एक गाणे गा असा आग्रह धरला आणि मास्टर हरखून गेले. मात्र दीदींनी त्या ध्वनिमुद्रिकांत गायलेल्या गायिकांच्या आवाजाची नक्कल करीत ती गाणी हुबहू गायली होती. त्यांनी लतादीदींचा आवाज ध्वनिमुद्रीत केला आणि ते दीदींना घेऊन ताबडतोब दीदींना शशधर मुखर्जी या निर्मात्याकडे नेले. मुखर्जींनी लतांचे ध्वनिमुद्रीत गाणे ऐकले. मूळातच अतिशय कोवळा आणि विशिष्ट पातळीवर लीलया जाणारा आवाज, त्यात कोवळे वय. शशधर मुखर्जींच्या चित्रपटातील नायिका कामिनी कौशल वयाने लतादीदींपेक्षा मोठी होती आणि त्यामुळे हा पातळ आवाज त्या नायिकेला शोभणार नाही अशा अर्थाने त्यांनी यह आवाज नहीं चलेगी! असं म्हटलं असं म्हणतात. यात नायिकेसाठी हा आवाज चालणार नाही असं त्यांना म्हणायचं असावं! आणि ते खरेच होतं. कारण पुढे याच शशधर मुखर्जी यांनी अनारकली आणि नागिन या चित्रपटांसाठी दीदींकडून काही गाणी गाऊन घेतली!

परंतू यह आवाज नहीं चलेगी असं ऐकल्यावर मास्टर गुलाम हैदर रागावले. त्यांनी काहीशा तिरीमिरीनेच दीदींना स्वत:सोबत यायला सांगितले. एका स्टुडिओमध्ये एका चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं आणि त्या चित्रपटासाठी एक गाणं हवं होतं स्त्री गायिकेचं. दीदी आणि मास्टरजी रेल्वे स्टेशनवर पोहोचले. मास्टर्जींनी खिशातून ५५५ ब्रॅन्डचं सिगारेटचं पाकीट काढलं आणि त्यावर ठेका धरला. आणि दीदींना गाण्याचा मुखडा सांगितला… दिल मेरा तोडा…. हाय… मुझे कहीं का न छोडा! मुखर्जींनी बहुदा गुलाम हैदर यांचं दिल फारच जोरात तोडलं असावं! मग त्यांनीही जिद्दीनं जगाला कहीं का सोडलं नाही! रेल्वेगाड्यांच्या, प्रवाशांच्या, विक्रेत्यांच्या गदारोळात एक भावी गानसम्राज्ञी गात होती! मास्टर गुलाम हैदर त्यांनी त्याच दिवशी दीदींकडून काही गाणी गाऊन घेतली. चित्रपटाचं नाव होतं मजबुर (1948). मुन्नवर सुलताना नावाची अभिनेत्री या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होती. आणि तिच्यासाठी शमशाद बेगम किंवा नूरजहां यांचा आवाज मास्टर गुलाम हैदर वापरतील असा सर्वांचा होरा होता. परंतु त्यांनी तर लता मंगेशकर नावाच्या नव्या मुलीला हे गाणं देऊ केलं होतं. त्यामुळे निर्माते नाराज झाले होते. यावर मास्टरजींना अतिशय राग आला. आधीच शशधर यांनी नकारघंटा वाजवून मास्टरजींच्या पारखी नजरेवर प्रश्नचिन्ह उमटवलं होतंच! त्यांनी मी हा चित्रपट करणारच नाही असं सांगितलं आणि आपल्या साहाय्यकाला निर्मात्यांचे पैसे परत देण्यास फर्मावले. आणि त्याला त्यांना हे ही बजावून सांगायला सांगितलं की ही छोटी मुलगी पुढे गानसम्राज्ञी होईल हे लक्षात ठेवा! पण सुदैवाने निर्मात्यांनी गुलाम हैदर यांचे म्हणणे मान्य केले. आणि मजबूर ची गाणी लतादीदींना मिळाली. मास्टर गुलाम हैदर अतिशय कडक शिस्तीचे संगीतकार होते.. त्यांनी लतादीदींकडून अतिशय मेहनत करून घेतली. मास्टरजींकडे दीदींचं पहिलं गाणं जे ध्वनिमुद्रीत झालं ते मुकेश यांच्यासह गायलेलं होतं…. अब डरने की कोई बात नहीं… अंग्रेजी छोरा चला गया!

आता दीदींना आपला स्वत:चा आवाज गवसला होता. दिल मेरे तोडा या गाण्याच्या ध्वनिमुद्रणानंतर मास्टर गुलाम हैदर यांनी लतादीदींना सांगितलं… लोक नूरजहांला सुद्धा विसरून जातील तुझं गाणं ऐकल्यावर! मास्टरजींची भविष्यवाणी पुढे अक्षरश: प्रत्यक्षात उतरली हा इतिहास आहे. चित्रपट संगीताच्या राज्याची अनभिषिक्त सम्राज्ञी यशस्वीपणे जगापुढे आणण्याचं भाग्य लाभलेल्या या श्रेष्ठ संगीतकाराचं नाव गुलाम असावं हा योगायोग. आणि यांची भेट घडवून आणण्यात लोकांना व्याजानं पैसे देऊन ते दामदुप्पट वसूल करणा-या एका पठाणाची भूमिका असावी.. हा ही योगायोगच. या अर्थाने या पठाणाचे कर्ज रसिकांच्या माथी आहेच आणि ते कधीही फिटणार नाही! आणि मास्टर गुलाम हैदर… या गुलाम नावाच्या माणसाने आपल्याला गाण्याची राणी नव्हे सम्राज्ञी दिली हे ही खरेच. गुलाम या नावाचा अर्थ केवळ नोकर, सेवक, दास असा नसून स्वर्गातील देखणे, तरूण सेवेकरी असाही होतो! आपल्या चित्रपट संगीताच्या बाबतीत या गुलामाने मोठीच सेवा केली असं म्हणायला काही हरकत नाही, असं वाटतं. दस्तुरखुद्द लता दीदींनीच मास्टर गुलाम हैदर यांना त्यांचा ‘गॉडफादर’ म्हटलं आहे! मास्टर गुलाम हैदर नंतर पाकिस्तानात परतले. त्यांच्या पत्नीला लतादीदी मां जी म्हणून संबोधत आणि त्यांच्या मुलांना भाऊ मानत. मास्टरजी खूप आजारी पडले होते तेंव्हा त्यांना दीदींना भारतात उपचारांसाठी येण्याची विनंतीही केली होती आणि सर्व खर्चही करण्याची तयारी दाखवली होती.

लतादीदींबद्दल आणखी दोन तीन लेख होतील एवढं डोक्यात आहे. आपली पसंती समजली तर लिहावं असा विचार आहे.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “निळंशार गवत…” – लेखक : वैद्य परीक्षित शेवडे ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “निळंशार गवत…” – लेखक : वैद्य परीक्षित शेवडे ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

एक जुनी लोककथा आहे

एकदा एक गाढवाने वाघाला म्हटलं; “कसलं निळंशार गवत आहे बघ.”

वाघ म्हणाला; ” निळं गवत? उगाच काहीही काय सांगतो रे? गवत हिरवं असतं. हेही तसंच हिरवं आहे की.”

“अरे बाबा निळंच आहे हे गवत. तुझे डोळे खराब झाले आहेत.” असं म्हणून गाढवाने “वाघाचे डोळे खराब झाले आहेत” म्हणून सगळीकडे आरडाओरडा सुरू केला. 

यामुळे वैतागलेला वाघ सिंहाकडे गाढवाची तक्रार घेऊन गेला. पूर्ण प्रकरण सांगितल्यावर वाघ म्हणाला; 

“महाराज; गवत हिरवं असूनही गाढव मला मात्र निळंच असल्याचं सांगत राहिला. आणि बाकीच्या लोकांना पूर्ण प्रकरणही न सांगताच थेट माझे डोळे खराब आहेत म्हणून खुशाल माझी बदनामी करत सुटलाय. याला शिक्षा करा महाराज.” 

सिंहाने बाजूला पडलेल्या हिरव्यागार गवताच्या गंजीकडे शांतपणे पाहिलं आणि वाघाला चार चाबकाचे फटके मारायची शिक्षा सुनावली आणि गाढवाला सोडून दिलं !

या निर्णयामुळे हैराण झालेल्या वाघाने सिंहाला शिक्षेबद्दल विचारलं. 

” महाराज; इतकं हिरवंगार गवत समोर दिसत असूनही तुम्ही त्याला सोडलं आणि मलाच उलट शिक्षा? असं का महाराज?”

सिंह म्हणाला; ” शिक्षेचं गवताच्या रंगाशी काही देणंघेणं नाहीये. ते हिरवंच आहे; हे तुला मलाच काय .. सगळ्या जगाला माहिती आहे. पण तू वाघ असूनही एका गाढवाशी वाद घालत बसलास यासाठी तुला शिक्षा दिली आहे “

आपल्या आयुष्यात; त्यातही विशेषत: सोशल मीडियावर कोणाशी वाद घालत बसायचं याचा निर्णय नीट घेत चला ! सुप्रभात !!

लेखक – वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares