मराठी साहित्य – विविधा ☆ पोकळी आणि श्रद्धांजली ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

पोकळी आणि श्रद्धांजली ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“आज xxx xxx यांच्या जाण्यामुळे कधीही भरून न निघणारी अशी एक पोकळी निर्माण झाली आहे !”

हे एखाद्या नेत्याच्या किंवा एखाद्या मान्यवराच्या तोंडातलं वाक्य, कोणी दिग्गज कलाकार किंवा नेता आपल्या सर्वांना कायमचा सोडून गेल्यावर त्या मृत व्यक्तीला श्रद्धांजली वाहतांना हमखास ऐकायला मिळत. पण या वाक्याचं खरेपण किती पोकळ आहे हे आपल्या सर्वांच्या मनांत असलं, तरी उघडपणे ते कोणी बोलून दाखवत नाही. कारण शिष्टाचार !

अशा कोणा एकाच्या जाण्यामुळे आपल्या सर्वांच्याच जीवनात खरंच अशी, कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण होते का हो ? आपण मला विचाराल तर पोकळी वगैरे काही नाही, पण थोडे दिवस त्या व्यक्तीच्या आठवणीने दुःख होतं, व्याकुळ व्हायला होतं वगैरे, वगैरे ! गेलेली व्यक्ती आपल्या किती जवळची होती यावर त्या दुःखाची इंटेंसिटी अवलंबून असते, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे.

मंडळी, राम-कृष्णासारखे अवतार या भूतलावरून गेले तरी जग रहाटी थांबल्याचे किंवा एखादी कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाल्याचे माझ्या तरी ऐकीवात नाही. त्यामुळे आपल्या सारख्या मर्त्या मानवामुळे आपण गेल्यावर पोकळी वगैरे निर्माण व्हायचा प्रश्नच कसा निर्माण होईल ? एखादी व्यक्ती जग सोडून गेल्यावर तो किंवा ती, आपल्या कितीही जवळचा किंवा जवळची असली तरी हे त्रिवार सत्य आपण नाकारू शकतो का ? अगदी आपले आई वडील गेल्यानंतर सुद्धा, कोणी उरलेल्या सगळ्या आयुष्यात दुःख करत हातावर हात ठेवून बसलाय असं माझ्या तरी पाहण्यात नाही. शेवटी प्रत्येकाला स्वतः जिवंत राहण्यासाठी स्वतःच हातपाय हलवणे गरजेचे नाही का ? यावर हे “तुमचं पोकळ मत पटलं नाही बुवा !” असं कोणीही म्हणू शकेल, त्याला माझा ईलाज नाही. पण या बाबतीत भा. रा. तांबे यांच्या कवितेच्या “जन पळ भर म्हणतील….. ” या अजरामर ओळी आपण आठवून पहा, असं मी त्या लोकांना नक्कीच सांगेन ! असो !

मंडळी, अनेक शोक सभांच्या दुःखद प्रसंगी, त्याला किंवा तिला श्रद्धांजली वाहतांना ज्याच्या त्याच्या तोंडी तेच तेच वाक्य ऐकून मला तर कधी कधी हसू येत, अर्थात मनातल्या मनांत ! कारण असा एखादा दिग्गज कलाकार गेला, तरी भविष्यात कुठल्यातरी नवीन कलाकाराची अदाकारी किंवा त्याच गाणं किंवा वादन ऐकून आपल्याला गेलेल्या कलाकाराची आठवण येते असं आपण अनेकदा म्हणतो! गेलेल्या नेत्याच्या बाबतीत आजच्या “या” तरुण नेत्यामधे “त्या अमुक तमुक नेत्याचे” गुण दिसतात, असं म्हटलं जात.

आपली मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी ज्यांची काहीच भरीव कामगिरी नाही, पण ज्यांना सामान्यपणे आपली माय मराठी भाषा बोलता अथवा लिहिता येते, कळते, तो किंवा ती सुद्धा माझ्या आधीच्या वाक्याशी सहमत होतील, याची मला खात्री आहे !

“आज xxx xxx यांच्या जाण्यामुळे कधीही भरून न निघणारी अशी एक पोकळी निर्माण झाली आहे !” हे लेखाच्या सुरवातीच वाक्य आपल्याकडे सर्वात प्रथम कोणी आणि कोण गेल्यावर त्याला किंवा तिला श्रद्धांजली वाहतांना उच्चारलं असेल, या बद्दल मला खरंच माहिती नाही, पण मला ते जाणून घ्यायची पोकळ नाही पण भरीव इच्छा नक्कीच आहे ! या बाबत श्रद्धांजली वाहण्याच्या विषयात तज्ञ असलेली मंडळी, मला पोकळ आश्वासन न देता काहीतरी ठोस माहिती पुराव्यासकट देतील अशी मला आशा आहे.

बरं वर्षान वर्ष कोणत्याही श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात हेच वाक्य अजून आपली जागा राखून आहे, याच सुद्धा मला कधी कधी नवल वाटतं ! आपली मराठी भाषा इतकी समृद्ध असतांना या वाक्याला अजून तोडीस तोड वाक्य मिळू नये, हे मराठी भाषेच दुर्दैव म्हणायचं का ? का या गंभीर विषयात “आपण कशाला नाक खुपसा” असा सूज्ञ विचार मराठी भाषेच्या विचारवंतांनी किंवा श्रद्धांजली वाहण्यात एक्स्पर्ट असलेल्या लोकांनी केला आहे ? पूर्वापार चालत आलेल्या जशा अनेक परंपरा आपल्याकडे आपण डोळे मिटून पाळत आहोत, तशाच पद्धतीने हे घासून गुळगुळीत आणि पोकळ झालेलं वाक्य, अशा दुःखद प्रसंगी श्रद्धांजली वाहणाऱ्याच्या तोंडातून आपोआप बाहेर येत असावं, असं मला स्वतःला कधी कधी मग वाटून जात.

एखादा माणूस आपला मुद्दा दुसऱ्याला समजावतांना त्याच्या बोलण्यातून, देह बोलीतून तो खरंच मनापासून पोट तिडकीने बोलतोय का वरवरच बोलतोय, हे सामान्यपणे लोकांना कळतं. पण या लेखाच जे ब्रीद वाक्य आहे ते कोणी कधीही, कितीही वेळा बोलला तरी त्यातील पोकळपणा लगेच मला तरी दिसून येतो. अर्थात तो इतरांना सुद्धा दिसत, कळत असेल, पण वर म्हटल्याप्रमाणे तो उघडपणे म्हणून दाखवायचं किंवा बोलायचं हे शिष्टाचाराच्या आड येत असल्यामुळे तसं कोणी बोलून दाखवत नाही, हे ही तितकंच खरं !

शेवटी, इतक्या वर्षांनी आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्या नंतर, आता तरी मराठी भाषेच्या अभ्यासकांनी या “पोकळ” भासणाऱ्या वाक्याला बदलून, त्या ऐवजी अशा श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला काहीतरी नवीन असं भरीव वाक्य तयार करावं, शोधावं असं मला मनापासून वाटतं ! त्यामुळे होईल काय, गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला, या श्रद्धांजलीच्या नवीन वाक्याने थोडं तरी आत्मिक समाधान मिळेल, अशी आशा करायला काय हरकत आहे ?

ताजा कलम – आपण अटेंड केलेल्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात, एखाद्या वक्त्याने “पोकळी” या शब्दाशिवाय कोणाला श्रद्धांजली वाहिली असेल, तर कृपया मला ते वाक्य जरूर कळवा !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साडी म्हणोनी कोणी – लेखिका : सौ. क्षमा एरंडे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ साडी म्हणोनी कोणी – लेखिका : सौ. क्षमा एरंडे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

“ मावशी, उद्या कॉलेज मध्ये साडी डे‌ आहे, मी तुझी पैठणी नेसणार आहे चालेल ना तुला?”

“अगं चालेल काय पळेल, पण ब्लाऊज…… “,

“don’t worry मावशी I will manage”… ‘इती केतकी’,

एक बरं आहे या जनरेशनचे, त्यांच्याकडे सर्व पर्याय उपलब्ध असतात. केतकी येईलच इतक्यात…… पैठण्या पण दोन तीन त्यातली तिला कोणती आवडेल… जाऊ देत तिन्ही तिच्यासमोर ठेवाव्यात, आवडेल ती नेसेल. आपण पैठणी नेसून किती वर्ष, महिने झालेत आठवायलाच हवे.

कपाट उघडले तसा कपाटातून आवाज येऊ लागला. कोणी तरी आपापसात बोलत आहेत असा मला भास झाला.

“अगं मला नेस मला नेस, ” आवाजाच्या दिशेने पाहते तर‌, हॅंगर जोरदार हेलकावे घेत होते. नारायणपेठी हलल्यासारखी वाटली,

“ए तू बाजूला हो गं, ” नारायण पेठीला कोणीतरी दूर लोटले. तशी ती पटकन बाजूला झाली.

“बायकांना माहेरचा खूप खूप अभिमान असतो असं ऐकलं होतं, पण छे:, गेली वीस वर्षे मी बाहेरचं जग पाहिलं नाहीये. वीस वर्षांपूर्वी ‘सौरभच्या’ मुंजीसाठी, ‘माहेरची (पांढरी) साडी’, हवी म्हणून खास गर्भरेशमीची फर्माईश होती.. येतयं का काही लक्षात, बघ बघ जरा माझ्याकडे”.. बिचारी पांढरी साडी विरविरली.

‘अगं बाई खरंच की’, माझे मलाच वाईट वाटले.

आता सौरभचे लग्न ठरत आलयं. खरंच वीस वर्ष झाली आपण कसे काय विसरलो माहेरच्या साडीला. साडीला चुचकारले, आईची आठवण आली, क्षणभर गलबलल्या सारखे झाले.

“आम्ही पण कपाटात आहोत बरं का, तुझ्या लक्षात तरी आहे का, ‘बरोबर-बरोबर, आम्ही आता काकूबाई झालो ना., ‘अहो’ इंदोरला गेले होते, अहोंना किती instructions दिल्या होत्यास, डाळिंबी रंगच हवा, काठ सोनेरीच हवेत. सुरुवातीला नेसलीस, आता आम्ही बसलोय मागच्या रांगेत.. “ प्रेमाने मी इंदूरीवरून हात फिरवला. तशी ती आक्रसून गेली..

“माझ्याकडे बघता का जरा मी तर अजून गुलाबी कागदात तशीच आहे गुंडाळलेली”… अगं बाई खरंच वास्तूशांतीची आलेली, त्यालाही पाच वर्ष झाली.. मला तो रंग आवडला नव्हता, मग ती पिशवीत तशीच राहिली, नवी कोरी.. ” 

“मी कित्ती लकी आहे, डिझायनर बाईसाहेब पुटपुटल्या. “.. खरंच होतं तिचे.. पण, त्यातली मुख्य मेख तिला कुठं माहिती होती… तेवढा ‘एकमेव’ ब्लाऊज मला अंगासरशी बसत होता.

तेवढ्यात, शिफॉन बाईंनी लगेच तिला टाळी मागीतली,

“अगं मी नेसले ना की बाईसाहेब बारीक दिसतात, मग कायं, आमचा नंबर ब-याचदा लागतो बरंका…. “

कपाटातल्या साड्यांची सळसळ जरा जास्तच होवू लागली. पटकन कपाटाचे दार लावून टाकले.

आतल्या कांजीवरम, इरकलं कलकत्ता, पोचमपल्ली, ऑरगंडी, पुणेरी.. सगळ्यांची एकमेकींच्यात चाललेली कुजबूज बाहेर मला स्पष्ट ऐकू येत होती. प्रत्येकीची आपली आपली कहाणी होती. त्या कहाणीचे रूपांतर आता रडकथेत झाले होते आणि याला सर्वस्वी मीच जबाबदार होते..

बाहेर येऊन पहिलं गटागटा पाणी प्यायलं. खरंच मोजायला गेले असते तर ‘सेन्च्युरी’ नक्की मारली असती साड्यांनी. पण नाही नेसवत आता. काही जरीच्या साड्या जड पडतात. आताशा पंजाबी ड्रेसच बरे वाटू लागलेत. वावरायला सोप्पं पडतं ना. कपाटातल्या डझनभर साड्या मिळालेल्याच आहेत, तिथं आपल्याला choice थोडाच असतो. प्रेमापोटी मिळालेल्या, काही सरकवलेल्या(म्हणजे घडी बदल, इकडून तिकडे)मग काय नगाला नग, कपाट ओसंडून वाहणार नाही तर काय… सगळ्यांना सांगून दमले, आता काही देत जाऊ नका, साडी तर नकोच नको… पण…

असो…..

आता मात्र मनाशी पक्की खूणगाठ बांधली, जास्तीत जास्त वेळा साडीच नेसायची आणि हो, त्याच्यावरचे ब्लाऊज होण्यासाठी ‘१ तारीख आणि सोमवार’ ज्या महिन्यापासून येईल तेव्हा पासून जिम चालू करायचे..

मनावरचा ताण एकदम हलका झाला.

‘केतकी’ साठी पैठणीसोबत अजून दोन चार साड्या काढून ठेवल्या, तेवढीच हवा लागेल त्यांना.

खरं तर ‘साडी’ नेसणे‌ हीच समस्त महिला वर्गाची दुखरी नस‌ असावी…….

… हव्या हव्याश्या‌ तर वाटतात.. पण……

लेखिका : सौ क्षमा एरंडे

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

सांगली – ४१६ ४१६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “’शिवगंगा’ आली हो अंगणी…” ☆ सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “’शिवगंगा’ आली हो अंगणी…☆ सुश्री शोभा जोशी ☆

— झाबुआचा सर्वांगीण विकास

(अगदी आत्ताच्या काळात सुध्दा पाण्यासाठी वणवण करणार्‍या, २/२ मैलांवरून पाण्याचे हंडे डोक्यावरून वाहून आणून पाण्याची गरज भागवणार्‍या लोकांविषयी आपण ऐकतो पाहतो. विशेषतः महिलांना हे काम करावं लागतं. पावसाच्या पाण्याला योग्य प्रकारे अडवून, ते साठवून त्याचा पिण्यासाठी, शेतीसाठी, जंगलवाढीसाठी योग्य रितीने उपयोग केला तर हे संकट टळू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे झाबुआ या आदिवासी बहुल भागात ‘शिवगंगा’ संस्थेने केलेलं काम. )

‘माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं।

गुलाब जाई जुई मोगरा फुलवितं’।।

खरं तर आपल्या देशातील बर्‍याच गावांमध्ये पाटाचं पाणी ही कवी कल्पनाच राहिली आहे.

माणूस, प्राणी, पशू पक्षी, झाडं एकूणच जीवसृष्टीसाठी पाणी किती महत्वाचं आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. जीवसृष्टीच्या निर्मितीपासूनच पाण्याचं महत्व अधोरेखित झालं आहे.

महाभारतात कौरव-पांडव युध्दानंतर युधिष्ठिराच्या राज्यात एकदा नारदमुनी त्याच्या भेटीला गेले. प्रजेचे क्षेमकुशल विचारताना त्यांनी युधिष्ठीराला विचारले…

कच्चित राष्ट्रे तडागानी पूर्णानि वहन्ति च।

भागशः विनिविष्टानि न कृषि देवमातृका।।

हे राजा, तुझ्या राष्ट्रात जलसिंचनासाठी मोठमोठे तलाव खोदण्यात आले आहेत ना? हे सर्व तलाव पाण्याने पूर्ण भरलेले आहेत ना? शेती, देवमातृका म्हणजे केवळ पावसाच्या पाण्यावर निर्भर नाही ना? ‘ म्हणजेच पावसाचं पाणी साठवणं हे हजारो वर्षांपूर्वी सुध्दा महत्वाचं मानलं जायचं हे नारदांनी विचारलेल्या प्रश्र्नावरून सिध्द होतं.

झाबुआ हा मध्यप्रदेशातील एक जिल्हा. जिल्ह्याची लोकसंख्या १०२४०९१ (२०११ च्या जनगणनेनुसार) आहे. जिल्ह्याची समुद्रसपाटीपासून उंची११७१’ आहे. साक्षरतेचं प्रमाण ४४. ४५% आहे. प्रमुख नद्या माही, अनास या आहेत. जिल्ह्यामध्ये जवळ जवळ ३७%लोक भिल्ल, भिलाला आणि पटालिया या जनजातींचे आहेत. इथल्या जनजातींबद्दल बरेच गैरसमज पसरविले गेले होते. त्यांना बदनाम करण्यात आले होते.

झाबुआ जिल्ह्यात पाऊस बर्‍यापैकी पडतो. पण ते पाणी अडविण्याची सोय नसल्यामुळे सर्व पाणी वाहून जात असे. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होई. पिण्याला पाणी मिळणे दुरापास्त होई. जंगले उजाड होत. जल, जंगल, जमीन यावर अवलंबून असलेले आदिवासी ना धड शेती पिकवू शकत ना जंगल संपत्तीवर गुजराण करू शकत. त्यामुळे त्यांना कामाच्या शोधात गुजराथ, महाराष्ट्र किंवा इतर राज्यात जावे लागे.

काही संस्थांनी या भागात पाण्याच्या व इतर समस्यांवर कामं केली पण त्यात त्यांनी आदिवासींना सहभागी करून घेतले नाही. त्यांच्या समस्या जाणूनच घेतल्या नाहीत. त्यामुळं ही कामं वरवरची झाली. त्यांच्या समस्या तशाच राहिल्या.

या समस्या खर्‍या अर्थी दूर केल्या पद्मश्री प्राप्त महेशजी शर्मा आणि त्यांच्या टीम मध्ये असलेल्या डाॅ. हर्ष चौहान, राजाराम कटारिया आणि इतर सहकार्‍यांनी.

पद्मश्री प्राप्त महेशजी शर्मा, संघाचे स्वयंसेवक. १९९८ला संघाने त्यांच्यावर वनवासी कल्याण परिषदेची जबाबदारी सोपवली. महेशजींनी झाबुआ जिल्ह्यात प्रवास केला. लोकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की, ज्या लोकांना चोर, दरवडेखोर ठरवून त्यांच्याबद्दल गैरसमज पसरविण्यात आले आहेत. प्रत्यक्षात हे लोक अतिशय प्रामाणिक, कष्टाळू आहेत. कोणाचे पैसे बुडवत नाहीत. एकमेकांना मदत करण्याची वृत्ती आहे. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांची पाणी ही मुख्य समस्या आहे. म्हणून शर्माजींनी त्यावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले.

२००७ साली त्यांनी ‘ शिवगंगा ‘ प्रकल्पाची स्थापना केली. त्यांच्या मदतीला होते, दिल्ली आय आय टी मधून सुवर्णपदक प्राप्त करून एम् टेक् झालेले, देश-विदेशातील उच्चपदस्थ नोकर्‍यांकडे पाठ फिरवलेले, संघ प्रचारक, भिल्ल राजघराण्यातले श्री. हर्ष चौहान आणि जनजातीतील राजारीम कटारिया, ज्यांनी पदवी प्राप्त केल्यानंतर जनजातीतील लोकांसाठीच काम करायचे ठरविले. हे तिघे वत्यांचे इतर साथीदार यांनी झाबुआला जलमय करायचे ठरविले.

या टीमने प्रथम गावातील तरूणांबरोबर संवाद साधला. संकटात साह्य करणार्‍या गावातील तरूणांचे सघटन केले. इंदोर मध्ये ‘ ग्राम इंजिनियर वर्क ‘ या संस्थेमध्ये त्यांना प्रशिक्षण दिले. पहिल्यांदा ६ ‘ उंचीचे तलाव बांधून पाणी अडविण्यास सुरूवात केली.

महाभारतातील कथेनुसार भगिरथाने तपश्र्चर्या करून गंगा पृथ्वीवर आणली तेव्हा तिचा आवेग पृथ्वीला सहन होणार नाही म्हणून शंकराची प्रार्थना करून त्याच्या जटांमधून ती जमिनीवर आणली.

अगदी याच तत्वाचा अवलंब करून ‘शिवगंगा ‘ च्या कार्यकर्त्यांनी२००७ पासून पाणी अडविण्यास सुरूवात केली. पावसाळ्यात डोंगरातून धो धो वाहणारे, नुसतेच वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा पिण्यासाठी, शेतीसाठी उपयोग करण्यात येऊ लागला. लोकांच्या साह्याने तलाव बांधले गेले. हजारो बांध बांधले. ग्राम अभियंत्यांना; समतल रेषा, (कंटूर) काढण्याचं, बांध बंदिस्ती, नाला बंडिंगचं, पाणलोट, वृक्ष लागवड यांचं शास्रीय शिक्षण देण्यात आलं. इंजिनिअर्स आणि स्थानिक लोकांच्या सहकार्याने हाथीपावा पहाडावर १ लाख ११ हजार समतल रेषा (कंटूर ट्रेन्स) पाणी प्रकल्प राबविले. ३५० गावांमध्ये रिचार्जींग हॅंडपंप बसविण्यात आले. ४५०० मेड बंधान, चेक डॅम, तलाव इ. च्या माध्यमातून करोडो लिटर पाणी जमिनीत मुरले आणि जमिनीतील पाण्याचा साठा वाढला. झाबुआ जिल्हा दुष्काळ मुक्त झाला. जिथे वर्षात एकदा मक्याची शेती व्हायची तिथं वनवासी लोक गव्हाची शेती करायला लागले. वर्षातून दोन पिकं घेऊ लागले.

शेतीबरोबरच त्यांना हस्तकलेचे, बांबूपासून निरनिराळ्या वस्तू तयार करण्याचे, कुंभारकामाचे शिक्षण देण्यात आले. बी-बियाणे, वनौषधी यांच्या पारंपारिक जतन करण्याच्या पध्दतीला चालना देण्यात आली.

हलमा… या लोकांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ‘ एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ ‘या उक्तीनुसार संकटात असलेल्या भिल्ल कुटुंबाला, सर्व कुटूंबे एकत्र येऊन साह्य करतात. उदा. एखाद्याचे घर पडले तर गावातील सर्वजण एकत्र येऊन त्याचे घर उभे करून देतात.

पडजी… शेतीचे काम असेल तर ८/१० कुटुंबं एकत्र येतात आणि शेतातील कामं निपटतात.

मातानुवन… हा उत्सव वर्षातून ५/६ वेळा सर्व भिल्ल एकत्र येऊन साजरा करतात.

वृक्षारोपण… दुष्काळामध्ये झाडं लावणं बंद झालं होतं. पण आता पुन्हा वन उभारणीचे काम सुरू झाले आहे. ११० गावात ७०, ००० वर झाडे लाऊन झाली आहेत.

विशेष म्हणजे रूरकी, मुंबई, दिल्ली इ. ठिकाणच्या IIT चे विद्यार्थी इथे प्रशिक्षणास येतात.

शिवगंगा’ प्रकल्पाने फक्त जलसंवर्धनाचेच काम केले नाही तर आदिवासींचा सर्वांगीण विकास, ग्रामविकास, स्वयंरोजगार याबरोबरच जगाला पर्यावरण संरक्षणाचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.

©  सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “तुम्ही मुंबईतल्या खानावळीत कधी जेवला आहात काय?” – लेखक : प्रबोधनकार ठाकरे ☆ माहिती संकलन व प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “तुम्ही मुंबईतल्या खानावळीत कधी जेवला आहात काय? – लेखक : प्रबोधनकार ठाकरे ☆ माहिती संकलन व प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

जातिभेदाला पहिली थप्पड… (जुन्या आठवणी)

जुन्या मुंबईत चहाचे हॉटेल आणि पाव-बिस्कुटाची बेकरी हे दोन धंदे प्रामुख्याने भंडारी लोकांच्या हातांत होते. सबंध मुंबईला ब्रेड, पाव, लिमजी बिस्किटे या भंडारी बेकऱ्याच पुरवीत असत आणि गोऱ्या लोकांच्या खाणवळीतही त्या ब्रेड पावांची लज्जत वाखाणली जात असे. काही भंडारी हॉटेलात चहाशिवाय मांसाहाराची फार चोखट सोय असे आणि अशी तीन-चार जुन्यांतली जुनी भंडारी हॉटेले कोटांत नि गिरगांवात अजून चालू आहेत. भंडारी हॉटेलातच चहा मिळत असल्यामुळे, बामणांची पंचाईत व्हायची. गिरगांवात एक-दोन बामणांची छुपी हॉटेले गल्लीकुच्चीत असायची. तेथे गुपचूप जाऊन कित्येक बामण चहाची तलफ चोरून भागवीत असत. कारण, त्याकाळी हॉटेलात उघडपणे चहा पिणे अथवा काही खाणे प्रशस्त मानले जात नसे. चार-पाच मंडळींनी कुडाच्या पडद्याआड गुपचुप बसून खावे प्यावे नि पसार व्हावे. दारूच्या गुत्त्यांत शिरणारांकडे लोक जितक्या कुत्सित काण्या नजरेने पाहत नि धिक्कार दर्शवीत, त्याच नजरेने लोक हॉटेलगामी प्राण्यांकडे पाहत असत. मात्र या बामणी छुप्या हॉटेलात बामणांचाच प्रवेश व्हायचा. इतरांना तेथे मज्जाव असायचा.

पहिल्यापासूनच मुंबई शहर म्हणजे नोकरमान्यांचे माहेरघर. बाहेरगांवाहून नोकऱ्यांनिमित्त तरुणांच्या टोळ्याच्या टोळ्या नित्य येथे यायच्या. बिन-हाडाची (म्हणजे चंबूगबाळे ठेवण्याची सोय एखाद्या ओळखीच्या किंवा नातेवाईकाच्या ओसरीवर झाली, तरी मम्मंची ब्याद तो किती दिवस भागवणार? अर्थात, सार्वजनिक खाणावळीची आवश्यकता पुढे आली. या दिशेने पहिला धाडसी यत्न भटवाडीतल्या सखूबाईने केला. विधवा बाईने असा एखादा स्वतंत्र धंदा अगर व्यवसाय करणे, ही कल्पनाच त्या काळी मोठी बंडखोर. शहाण्यासुरत्यांच्या भावना एकदम जखमी व्हायच्या! पण सखुबाईने सर्व सामाजिक विकल्पांना झुगारून खाणावळीचा धंदा सुरू केला. मुंबईच्या हिंदू खाणावळीच्या इतिहासात या सखूबाईचे नाव अग्रगण्य आहे. सखूबाईने खाणावळ उघडताच, पहिला मोठा पेचप्रसंगाचा प्रश्न आला, तो म्हणजे आमच्या नाठाळ जातीभेदाचा. खाणावळीत बामण येणार तसे इतर अठरापगड बामणेतरसुद्धा येणार. या सगळ्यांच्या निरनिराळ्या जातवार पंगती मांडायच्या तर मलबार हिलचे अंगणसुद्धा पुरायचे नाही. आणि बामणेतरांच्या पंगतीला बामणे जीव गेला तरी बसायची नाहीत. या पेचावर सखुबाईने दणदणीत तोड काढली. तिने प्रत्येक अन्नार्थी बुभुक्षिताला स्पष्ट बजावले- “माझी खाणावळ अन्नार्थ्यांसाठी आहे. मी बामण ओळखीत नाही नि जातपात मानीत नाही. प्रत्येक हिंदूला मी एका पंगतीला सारखे वाढणार… अगदी पाटाला पाट नि ताटाला ताट भिडवून वाढणार. जरूर असेल तर त्यांनी यावे, नसेल त्याने खुशाल भुके मरावे. मला त्याची पर्वा नाही. कोणी कुरबुर दुरदुर करील, त्याला भरल्या ताटावरून ओढून उठवून हाकलून देईन. “

झाले. कर्दनकाळ सखूबाईचा हा दण्डक जाहीर होताच, यच्चावत बामणे नि बामणेतर खाणावळीत पाटाला पाट भिडवून गुण्यागोविंदाने जेऊ लागले. सकाळ संध्याकाळ हजार-पाचशे पाने उठू लागली. हाताच्या बोटांवर मोजण्याइतके काही कर्मठ ब्राम्हण, सखुबाईच्या खास मेहरबानीने मुकटे नेसून एका लहानशा अंधाऱ्या खोलीत सोवळ्याने जेवत असत. त्या खोलीला सखूबाई ‘विटाळशीची खोली’ असे म्हणत. मोठ्या पंगतीत वाढणी चालत असली म्हणजे साहजिकच या सोवळ्या बामणांकडे वाढप्यांचे दुर्लक्ष व्हायचे. “अहो, आमटी आणा, चपाती आणा, हे आणा, ते आणा. ” असा ते ओरडा करायचे. बराच ओरडा झाला की सखूबाई गरजायची, “अरे बंड्या, त्या विटाळशा बाया काय बोंबलताहेत तिकडे पहा. ” त्या सोवळ्या जेवणारांनी तक्रार केली, तर बाई स्पष्ट सांगायची, “हे पहा, मोठ्या पंगतीचे काम टाकून तुमच्याकडे ‘पेशल’ पाहणार कोण? तुम्हाला सगळे ‘पेशल’ पाहिजे तर ते मला जमणार नाही. वाढप्याच्या सोयीसोयीनेच घेतले पाहिजे तुम्हाला. चांगले मोठ्या जमातीत बसून गुण्यागोविंदाने खावे, गप्पागोष्टी सांगाव्या, ते बसता कशाला त्या अंधाऱ्या खोलकटांत सुतक्यासारखे ?” 

सखूबाईचे उदाहरण पाहून मागाहून गिरगांवात आणखी तीन-चार ब्राह्मण विधवांनी खाणावळीचा उपक्रम केला आणि तो अगदी सखूबाईच्या शिस्तीने चालवला. झावबाच्या वाडीतली भीमाबाई आणि मुगभाटातली चंद्रभागाबाई यांच्या खाणावळी सारख्या जोरात चालत असत. दरमहा रुपये सात आणि साडेसात, असे दोनच भाव असत. सातवाल्यांना ताक आणि साडेसातवाल्याना दूध-दही एवढाच फरक. बाकी सगळी व्यवस्था सारखी. त्यात प्रपंच नाही. रविवारी काहीतरी “पेशल’ बेत असायचा आणि तो मंडळीना विचारून ठरायचा. सणावारी मिष्टान्न भोजनाच्यावेळी कोणी कमी जेवले तर बाई उस्तळायची, “कायरे, आधी कुठे हाटेलात शेण खाऊन आला होतास वाटतं?” असा भरमंडळीत टोमणा द्यायची. प्रत्येक आसामीला दरमहा चार पाहुण फुकट. मग ते ‘पेशल’ बेताला अथवा सणावारी आणले तरी तक्रार नाही. एखादा इसम दोन-तीन वेळा आला नाही, तर सखूबाई लगेच त्याच्या बिऱ्हाडी आपला माणूस पाठवून चौकशी करायची आणि आजारी असला तर तो बरा होऊन जेवायला परत येईपर्यंत दोन्ही वेळेला साबुदाण्याची पेज बिनचूक घरपोच पाठवावयाची. हा प्रघात बाकीच्या सर्व खानावळीतही पाळत असत.

सखूबाईच्या तोंडाला फारसे कोणी तोंड देत नसत. देईल त्याचे असे काही वाभाडे काढायची ती, का सगळ्या पंगतीची भरमसाट करमणूक! तिचा तोंडपट्टा चालला असता मध्येच कोणी काही बोलला तर एक पेटंट वाक्य असायचे, “चूप, मध्येच मला ‘ॲटरप्रॅट’ करू नकोस. अरे, एवढा मोठा तो जस्टिस रानडा नि तो चंद्रावर्खर ! माझ्या खाणावळीत जेवले म्हणून हायकोडताचे जड्ज झाले, समजलास. ” एखादाचे दोन महिन्यांचे बिल थकले आणि तो लाजेकाजेसाठी खाणावळीत येण्याचे टाळू लागला, तर बाई त्याला मुद्दाम बोलावून आणायची आणि हात धरून जेवायला घालायची. मग सगळ्या पंगतीत त्याची कानउघाडणी करायची, “अरे मुंबईची नोकरी म्हणजे अळवावरचं पाणी. आज गेली तर उद्या मिळेल दुसरी. पण मेल्या, उपाशी राहून तू काय करणार? उपाशी पोटाने नोकऱ्या मिळत नाहीत. तुझा हात चालेल तेव्हा दे पैसे. पण जेवायला टाळाटाळ करशील तर ओतीन भाताचे आधाण तुझ्या बोडक्यावर. ” पंगती चालल्या असताना, कमरेवर हात देऊन बाई पंगतीतून शतपावल्या घालायची. प्रत्येकावर काही ना काही टीका, टिप्पणी, टिंगल सारखी चालायची. सणावारी तर पोटभर जेवण्यावर तिचा फार मोठा कटाक्ष. मधून मधून एका रांगेने चार-पाच बामणे सारखे बसलेले पाहिले का मग सोवळ्यावर सखूबाईंचे टिंगलपुराण असे काही बेफाम चालायचे का पुढच्या खेपेला ते सारे बामण पंगत मोडून सरमिसळ बसायचे.

तात्पर्य, सहभोजनाने जातीभेदाचे बंध तुटले नाहीत तरी किंचित ढिले पाडण्याची कामगिरी आजकालच्या समाज-सुधारकांच्या कल्पनेत फुरफुरण्यापूर्वीच सखूबाईने हा धाडसी प्रयोग केलेला आहे आणि त्याचे महत्त्व हिंदूंच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासात डावलता येणार नाही.

लेखक : प्रबोधनकार ठाकरे

माहिती संकलन आणि प्रस्तुती : मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गीता जशी समजली तशी… – मला आवडलेले गीतेतील पाच श्लोक – भाग – ४ ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

☆ गीता जशी समजली तशी… – मला आवडलेले गीतेतील पाच श्लोक – भाग – ४ ☆ सौ शालिनी जोशी

मला आवडलेले गीतेतील पाच श्लोक

गीता हा अर्जुनाला पुढे करून सर्व मानव जातीला केलेला उपदेश आहे. ते आचरण शास्त्र आहे. त्यातील सर्वच श्लोक सारख्याच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यात सरस-निरस ठरवणे कठीण. तरीही ७०० श्लोकातून माझ्या दृष्टीने महत्त्वाचे वाटलेले पाच लोक निवडण्याचा प्रयत्न मी केला. त्यातील पहिला श्लोक म्हणजे उन्नतीचा मंत्रच व स्वावलंबनाचा धडा

 १) उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् l

 आत्मैव ह्यात्मनो बंन्धुरात्मैव रिपुरात्मन:ll(६/५)

माणसाने स्वतः स्वतःचा उद्धार करावा. स्वत:च स्वतःच्या नाशाला कारण होऊ नये. प्रत्येक जण आपणच आपला बंधू (हित करणारा) आणि आपणच आपला शत्रू (अधोगती करणारा )असतो.

यातून लक्षात येते की प्रत्येकाने आपल्यातील दोषांकडे दुर्लक्ष न करता ते घालवण्याचा व सद्गुण जोपासण्याचा प्रयत्न करावा म्हणजेच बंधू व्हावे. ‘ जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला’ हेच येथे लक्षात ठेवावे. उच्च स्थितीला पोहोचावे व यशस्वी व्हावे.

अशा प्रकारे स्वतःच्या उद्धारासाठी कर्म करत असताना कोणते पथ्य पाळावे हे सांगणारा दुसरा श्लोक

 २) कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l

 मा कर्मफलहेतुर्भूमा ते सङ्गोsस्त्वकर्मणी ll(२/४७)

कर्म करत असताना कर्त्याची भूमिका कशी असावी याची चार सूत्रे येथे सांगितली आहेत. कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, त्याच्या फळाविषयी कधीही नाही. कर्मफलाच्या इच्छेने कर्म करणारा होऊ नको. तसेच ते न करण्याच्या आग्रहही नको.

कर्म केल्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. म्हणून स्वधर्माने प्राप्त झालेले कर्म उत्तम प्रकारे आचरावे. पण त्याचे फळ मिळणे आपल्या हातात नसते. फळ मिळणे हा भविष्यकाळ आहे. त्यात रमून वर्तमानातील कर्मावर दुर्लक्ष करू नये. कामातील आनंद घ्यावा. कर्मफल काहीही मिळो, त्याला कारण मी असे समजून कर्तुत्व अभिमान घेऊ नये. येथे अकर्म म्हणजे कर्म न करणे. मी कर्मच करत नाही म्हणजे फळाचा प्रश्न नाही असा विचार करून कर्म त्यागणे अयोग्य आहे.

अशा प्रकारे केलेले कर्म ईश्वरार्पण कसे करावे हे पुढील श्लोकात.

 ३) यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्l

 यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्ll (९/२७)

भगवंत अर्जुनाला सांगतात तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस, जे तप करतोस ते मलाच अर्पण कर. माणसाची कर्मे ही साधारणपणे चार प्रकारची असतात आहार, यज्ञ, दान आणि तप. कर्म अर्पण करणे म्हणजे त्यातील कर्तृत्व भाव अर्पण करणे व फळ प्रसाद रूपाने ग्रहण करणे. यज्ञ म्हणजे फळांचा काही भाग समाजासाठी अर्पण करणे. दान म्हणजे सत्पात्री व्यक्तीला योग्य काळी शक्य ती मदत करणे आणि तप म्हणजे शरीर, मन आणि वाणी यांनी केलेली साधना. या सर्व ज्यावेळी भगवंतासाठी होतात, निस्वार्थ बुद्धीने अपेक्षा रहित होतात, तेव्हा प्रत्येक कर्म म्हणजे त्याची पूजा होते. त्याची प्राप्ती करून देणारे होते. बंध निर्माण होत नाही. अशीही कर्मा मागची खूबी व भक्तीचे व्यापकपण.

अशाप्रकारे कर्म करण्याचा अधिकार कोणाकोणाला आहे भगवंत सांगतात

 ४) मां हि पार्थ व्यपाश्रित्य येsपि स्यु: पापयोनय: l

 स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेsपि यान्ति परां गतिम् ll(९/३२)

हे अर्जुना, स्त्रिया, वैश्य, शूद्र तसेच पापयोनी कुणीही असो माझ्या आश्रयाला आले असता परमगतीला प्राप्त होतात. म्हणजे भगवंत प्राप्तीचा अधिकार सर्वांना आहे. तेथे कोणताही भेदभाव नाही. म्हणून सर्व जातीत आणि स्त्रिया सुद्धा संत पदाला पोचल्या. त्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतली. जो त्याच्या आश्रयाला जातो तो त्याचाच होतो. वेदाने जे अधिकार नाकारले ते गीतेने मिळवून दिले. म्हणून शबरी अनन्य भक्तीने मुक्त झाली व वाल्याचा वाल्मिकी झाला. आपणही जातीपातीवरून भेदभाव करू नये. सर्वाभूती परमेश्वर लक्षात घ्यावे.

गीता ग्राह्य व अग्राह्य दोन्ही गोष्टी सांगते. कोणत्या गुणाचा त्याग करावा म्हणजे सत मार्ग सापडतो त्याचे मार्गदर्शन गीता करते.

 ५) त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मन:l

काम: क्रोधस्तथा लोभस्तादेतत्त्रयं त्यजेत्ll(१६/२२)

काम क्रोध आणि लोभ ही तीन प्रकारची नरकाची द्वारे आहेत. आपला नाश करणारी आहेत. म्हणून या तिघांचा त्याग करावा.

हे तीनही तामसी गुण आहेत. माणसाच्या अधोगतीला कारण होणारे आहेत. मोठे मोठे विद्वानही यांच्या अधीन होऊन आपल्याच अपयशाला कारण झाले. उदाहरणार्थ विश्वामित्र (काम), दुर्वास (क्रोध). अतृप्त इच्छा क्रोधाला जन्म देतात. त्या कामना पूर्ण करण्यासाठी द्रव्यासक्ती निर्माण होते हाच लोभ. त्यासाठी अवैध मार्गाचाही अवलंब केला जातो. परिणामतः नरकासारख्या हीन अवस्थेत राहण्याची वेळ माणसावर येते. म्हणून योग्य वेळीच विवेक व वैराग यांच्या बळावर या तीनही टाळाव्या व मिळेल त्यात सुखी समाधानी राहावे.

अशा प्रकारे स्वतः स्वतःचे हित साधणे. फलेच्छारहित कर्म करणे. ते ईश्वरा अर्पण करणे. असे कर्म कोणीही करू शकतात. मात्र तेथे लोभ नको. हा मार्ग सुख समाधान देणारा. म्हणून मला हे पाच श्लोक आवडले. नित्य आचरणात आणण्यासारखे आहेत.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्मृतिगंध — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ मोठ्या मनाचा छोटा सेल्समन ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

४ ) मनमंजुषा —

 “ स्मृतिगंध “ लेखक : अज्ञात प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

स्मृतिगंध…..

 

मला आठवतंय,…

खूप मोठं होईपर्यंत आम्ही लहानच होतो !

सगळंच स्वस्त होतं तेव्हा, बालपण सुद्धा….

भरपूर उपभोगलं त्यामुळे…. उन्हापावसात, मातीत, दगडात, घराच्या अंगणात, गावाबाहेरच्या मैदानात… कुठेही गेलं तरी बालपणाची हरित तृणांची मखमल सर्वत्र पसरलेली असायची…

 

आता तसं नाही…

लहानपणीच खूप मोठी होतात मुलं ! 

खूप महाग झालंय बालपण…. !

 

पूर्वी आईसुद्धा खूप स्वस्त होती,

फुल टाईम ‘ आईच ‘ असायची तेव्हा ती…… !

 आम्हाला सकाळी झोपेतून उठवण्यापासून ते रात्री कुशीत घेऊन झोपवण्यापर्यंत सगळीकडे आईच आई असायची….

 

आता ‘मम्मी’ थोडी महाग झालीय 

जॉबला जातेयं हल्ली. संडेलाच अव्हेलेबल असते…. ! 

 

मामा चे गाव तर राहिलच नाही….

मामा ने सर्वाना मामाच बनवल….

प्रेमळ मामा आणि मामी आता राहिलेच नाहीत पूर्वीसारखे….

आधी मामा भाच्यांची वाट पहायचे….

आता सर्वाना कोणी नकोसे झालाय….

 हा परिस्थितीचा दोष आहे…

 

मित्र सुद्धा खूप स्वस्त होते तेव्हा…

हाताची दोन बोटं त्याच्या बोटांवर टेकवून नुसतं बट्टी म्हटलं की कायमची दोस्ती होऊन जायची…. शाळेच्या चड्डीत खोचलेला पांढरा सदरा बाहेर काढून त्यात ऑरेंज गोळी गुंडाळायची आणि दाताने तोडून अर्धी अर्धी वाटून खाल्ली की झाली पार्टी… !!!

 

आता मात्र घरातूनच वॉर्निंग असते,

“डोन्ट शेअर युअर टिफिन हं !” 

मैत्री बरीच महाग झालीय आता.

 

हेल्थला आरोग्य म्हणण्याचे दिवस होते ते…. !!! 

 

सायकलचा फाटका टायर आणि बांबूची हातभर काठी एवढ्या भांडवलावर अख्ख्या गावाला धावत फेरी घालताना तब्येत खूप स्वस्तात मस्त होत होती…..

 

घट्ट कापडी बॉलने आप्पाधाप्पी खेळताना पाठ इतकी स्वस्तात कडक झाली की पुढे कशीही परिस्थिती आली तरी कधी वाकली नाही ही पाठ…

इम्युनिटी बूस्टर औषधं हल्ली खूपच महाग झालीत म्हणे…. !!!

 

ज्ञान, शिक्षण वगैरे सुद्धा किती स्वस्त होतं…..

फक्त वरच्या वर्गातल्या मुलाशी सेटिंग लावलं की वार्षिक परीक्षेनंतर त्याची पुस्तकं निम्म्या किंमतीत मिळून जायची…..

वह्यांची उरलेली कोरी पानं काढून त्यातून एक रफ वही तर फुकटात तयार व्हायची….

 

आता मात्र पाटीची जागा टॅबने घेतलीय,

ऑनलाईन शिक्षण परवडत नाही आज !

 

एवढंच काय, तेव्हाचे 

आमचे संसार सुद्धा किती स्वस्तात पार पडले….

शंभर रुपये भाडं भरलं की महिनाभर बिनघोर व्हायचो…

सकाळी फोडणीचाभात/पोळी किंवा भात आणि मस्त चहा असा नाष्टा करून ऑफिसमध्ये जायचं, जेवणाच्या सुट्टीत (तेव्हा लंच ब्रेक नव्हता) डब्यातली भेंडी/बटाटा/गवारीची कोरडी भाजी, पोळी आणि फार तर एक लोणच्याची फोड… !!

 रात्री गरम खिचडी, की झाला संसार…

 ना बायको कधी काही मागायची ना पोरं तोंड उघडायची हिंमत करायची…..

 

आज सगळंच विचित्र दिसतंय भोवतीनं…. !! 

Live-in पासून ते Divorce, Suicide पर्यंत बातम्या बघतोय आपण…. , मुलं बोर्डिंगमधेच वाढतायत, सगळं जगणंच महाग झालेलं….. !! 

 

काल परवा पर्यंत मरण तरी स्वस्त होतं…..

पण आता….

 तेही आठ दहा लाखांचं बिल झाल्याशिवाय येईनासं झालंय….

 

म्हणून म्हणतोय… जीव आहे तोवर भेटत रहायचं.. आहोत तोवर आठवत रहायचं……

नाहीतर आठवणीत ठेवायला सुद्धा कोणी नसणार…. ही जाणीव पण झाली तर रडत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल हो..

म्हणून जमेल तेवढे नातेवाईक किंवा मित्र गोळा करून ठेवा….

नाहीतरी ह्या स्मृतीगंधा शिवाय आहे काय आपल्याजवळ.. हो ना….. !!!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मकर संक्रांत आणि खगोलशास्त्र…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “मकर संक्रांत आणि खगोलशास्त्र…☆ श्री जगदीश काबरे ☆

पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे सूर्याच्या मागील अवकाशाची पार्श्वभूमी बदलते आणि सूर्य वेगवेगळ्या नक्षत्रांमधून जात असल्याचे दिसते. संपूर्ण चक्र 12 भागांमध्ये विभागले गेले आहे ज्याला राशिचक्र म्हणून ओळखले जाते आणि ज्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. त्या दिवशी मकर संक्रमण होते. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालताना, सूर्याच्या पार्श्वभूमीवर राशीचक्र बदलत असताना पृथ्वीच्या अक्षाचा कल सारखाच राहतो. परंतु, त्यामुळे एक गोलार्ध सूर्यासमोर सहा महिने आणि दुसरा सहा महिने सूर्याच्या मागे राहतो. यामुळे पृथ्वीवरील सूर्यकिरणांचा कोन सतत बदलत राहतो आणि सूर्य सहा महिने उत्तरेकडे आणि सहा महिने दक्षिणेकडे फिरल्याचा आभास देतो. यालाच भौगोलिक भाषेत उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणतात. मकर संक्रांतीत सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. कारण सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीनंतर, उत्तर गोलार्धात सूर्य उत्तरेकडे जाऊ लागतो आणि हिवाळा कमी होऊ लागतो. भारतासह उत्तर गोलार्धात उन्हाळा वाढू लागतो. हे 21 जूनपर्यंत होते, त्यानंतर सूर्याचे दक्षिणायन सुरू होते.

मकर संक्रांतीनंतर दिवस मोठे होतात आणि रात्री लहान होतात, उत्तर गोलार्धात 14-15 जानेवारीपर्यंत सूर्यास्ताची वेळ हळूहळू पुढे सरकते. त्यानंतर 21 मार्च ही तारीख येते, जेव्हा दिवस आणि रात्र अगदी समान असतात त्याला इक्विनॉक्स म्हणतात. याचा अर्थ सूर्य जवळजवळ उत्तर गोलार्धाच्या मध्यभागी असतो. सूर्यास्ताच्या वेळेत हळूहळू बदल होणे म्हणजे हिवाळा कमी होतो, त्यानंतर उन्हाळा वाढायला सुरुवात होते. कारण सूर्य उत्तर गोलार्धात जास्त काळ राहणार असतो.

सूर्याभोवती पृथ्वी फिरते हे सर्वज्ञात आहे, पण पृथ्वीवरून पाहताना पृथ्वीभोवती सूर्य फिरतो असं भासतं. याला सूर्याचं भासमान भ्रमण असं म्हणतात. सूर्य उगवताना ज्या तारकासमूहांच्या पार्श्वभूमीवर तो दिसतो ती जागादेखील रोज बदलते. एक-दोन दिवसांमध्ये सूर्याच्या स्थानातला बदल फार लक्षणीय नसतो. पण महिन्याभरात ही जागा अगदी निश्चितपणे बदललेली दिसते. आणि वर्षभरानंतर सूर्य पुन्हा नेमक्या त्याच तारकासमूहाच्या पार्श्वभूमीवर नेमक्या त्याच जागी दिसू लागतो. या तारखासमूहांना त्यांच्या आकारावरून जी नावे दिली गेली त्यांनाच आपण राशी म्हणतो. थोडक्यात, वर्षभरात सूर्य या विविध तारकासमूहांमधून भ्रमण करतो आहे असं भासतं म्हणजेच सूर्य विविध राशीमधून प्रवास करत असतो. वर्षभरात सूर्याच्या या भासमान भ्रमणाचा जो मार्ग त्याला ‘क्रांतिवृत्त’ असं म्हणतात.

या क्रांतिवृत्तावर सूर्याचं नेमकं स्थान कसं सांगायचं? मग त्यासाठी या क्रांतिवृत्ताचे बारा भाग पाडले आहेत. या बारा भागांना नावं देणं आलं. त्या प्रत्येक भागात दिसणाऱ्या तारकासमूहातले तारे काल्पनिक रेषांनी जोडले (हे म्हणजे लहानपणी ‘बिंदू जोडून आकृती तयार करा’ असा खेळ असायचा तसंच झालं!) तर तयार होणाऱ्या आकृतीचं पृथ्वीवरच्या विविध गोष्टींशी साधर्म्य आहे असं लक्षात आलं आणि नावांचा प्रश्न सुटला. मग ज्या तारकासमूहातली आकृती मगरीसारखी दिसत होती त्याला नाव दिलं मकर रास, वगैरे वगैरे. अनेकांना असं वाटतं की, राशींनी या अथांग अंतराळाचे बारा भाग केले आहेत. तसं मुळीच नाही. राशी या केवळ सूर्याच्या भासमान भ्रमणमार्गाचे भाग आहेत. आणि सूर्याचा भासमान भ्रमणमार्ग हा या अथांग अंतराळावर मारलेला एक छोटासा काल्पनिक पट्टा आहे.

वैज्ञानिकदृष्ट्या बोलायचे झाले तर सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात खरे तर 21 डिसेंबर होते, जेव्हा सूर्य दक्षिणायन संपवून उत्तरेकडे सरकायला लागतो. परंतु, भारत आणि उत्तर ध्रुवाच्या दरम्यान असलेल्या देशांमध्ये हा प्रभाव मकर संक्रांतीच्या दिवशी अधिक प्रभावी मानला जातो. ती तारीख 14 किंवा 15 जानेवारी असते. सध्या हा फरक 24 दिवसांचा आहे. तसेच दर वर्षीचा नऊ मिनिटे दहा सेकंद हा काळ साठत साठत जाऊन दर 157 वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस आणखी एक दिवसाने पुढे जातो. दर 1500 वर्षांनी पृथ्वीच्या परिभ्रमणाच्या अक्षात होणाऱ्या बदलामुळे हा फरक दिसून येतो. आजपासून 1200 वर्षांनंतर ही तारीख बदलून फेब्रुवारी महिन्यात येईल. 2001 ते 2007 पर्यंत 14 जानेवारीला मकर संक्रांत येत होती. पण 2008 मध्ये 14 जानेवारीला 12. 07 मिनिटांनी संक्रांत आली, त्यामुळे संक्रांतीचा सण त्याच वर्षी 15 जानेवारीला झाला. दरवर्षी ही वेळ 6 तास 9 मिनिटांनी पुढे सरकते आणि चार वर्षांत ती 24 तास 36 मिनिटांनी पुढे सरकते. परंतु, लीप वर्षामुळे ती 24 तासांनी मागे सरकते म्हणजेच दर चार वर्षांनी ती 36 मिनिटांनी पुढे सरकते. काही वर्षांत संक्रांतीची तारीख पुढे सरकते. सन 2009 ते 2012 पर्यंत संक्रांतीचा दिवस 14-14-15-15 होता. हे चक्र 2048 पर्यंत चालू राहील, त्यानंतर ते 14-15-15-15 असेल. नंतर 2089 पासून ते 15-15-15 -15 होईल. हे दर 40 वर्षांनी होईल. परंतु, 2100 हे वर्ष लीप वर्ष असूनही, 400 ने भागल्यास लीप वर्ष मानले जाणार नाही, कारण ग्रेगरियन कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे शतकपूर्तीच्या अंकास चारशेनी भाग जात नसेल, तर त्या वर्षी लीप वर्ष धरले जात नाही. त्यामुळे दर चारशे वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस तीन दिवसांनी पुढे जातो. म्हणून 2100 ते 2104 पर्यंत संक्रांतीच्या तारखा 16-16-16-16 अशा असतील.

सामान्यतः भारतातील सर्व सण हे चंद्राच्या चक्रानुसार असतात, त्यामुळे इंग्रजी दिनदर्शिकेनुसार त्यांच्या तारखा दरवर्षी बदलतात. म्हणूनच होळी, दिवाळीसारखे सण वेगवेगळ्या तारखांना येतात. परंतु मकर संक्रांती हा एकमेव सण आहे, जो सूर्याच्या भासामान भ्रमाणावर आधारित असतो. इंग्रजी कॅलेंडर देखील सूर्याच्या यात गतीवर आधारित आहे. म्हणून मकर संक्रांत दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला सध्या येते.

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पु. ल. – दि ग्रेट…” – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “पु. ल. – दि ग्रेट” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

मराठीत “लागण्याची” गंमत बघा:

बाजूच्या गावात एक चित्रपट *लागला* होता.

तो बघून परत येतांना वाटेत मित्राचा बंगला “लागला”.

त्याचा मुलगा माझ्या ऑफीस मध्ये नुकताच “लागला” होता.

बंगल्यात शिरतांना कमी उंचीमुळे दरवाजा डोक्याला “लागला”.

घरचे जेवायचा आग्रह करू “लागले”. मला जेवणात गोड “लागतं” हे माहिती असल्याने गोड केलं होतं.

भात थोडा “लागला” होता पण जेवण छान होतं. जेवणानंतर मला सुपारी दिली ती नेमकी मला “लागली”. पाहुण्यांना आपल्यामुळे त्रास झाला ही गोष्ट घरच्यांना फार “लागली”.

निघताना बस फलाटाला “लागली”*च होती, ती *”लागली”च पकडली.

पण भरल्या पोटी आडवळणांनी ती मला बस “लागली”. मग काय…

घरी पोहोचेपर्यंत माझ्या पोटाची मला भलतीच काळजी “लागली” कारण आल्या आल्या घाईची “लागली”.

थोडक्यात माझी अगदी वाट “लागली”..

घरची मंडळी हसायला “लागली”.

The only & only Great पु ल!!

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “हेल मेट…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “हेल मेट…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

.. “. आता समोरून त्या बाईक वर बसून गेलेली आमच्या मंदी सारखी वाटली!.. ती बाईक चालवणाऱ्याने जरा जास्तच स्पीड मधे माझ्या समोरून नेली ना!.. तिनं मला बघून तिकडं तोंडच फिरवलं!… थोडसा ओझरता चेहरा दिसला दोघांचा… कोण असावा बरं तो? दोघांनी डोक्याला हेल्मेट घातलं असल्याने नीट ओळखता आलं नाही… ती माझी मंदी होती का ? का आणि कुणी दुसरीच होती?… छे! छे! माझी मंदी असं छचोर वागणार नाहीच मुळी!… हं आता आठवलं त्या कर्णिकची शर्मिलाच असणार!… मला बऱ्याच वेळेला दिसलीय ना ती कुणा मित्रांच्या बरोबर हिंडताना… तिचं लक्ष नसायचं इतका मी तिच्या जवळून कितीतरी वेळा गेलोय… पण आपल्याला काय करायचं त्याबाबत… त्या कर्णिक जवळ काही बोलायची सोय नाहीच म्हणा… त्यांना तिचं हे असलं वागणं ठाऊकही असेल, कदाचित त्यांची संमती असेल तिला असं उंडगेपणा करायला… बाकी सोसायटीत उलटसुलट चर्चा काय कमी चालतात?… लोकांची कुठे तोंड बंद करता येतात का?… का म्हणून या पोरटीने आपला सुखाचा जीव धोक्यात टाकावा… चांगल्या कुटूंबातील मुलाशी लग्न करून कसा सुखाचा संसार करायचा सोडून… हेल मेट ची का अवदसा आठवतेय कुणास ठाऊक?… नशीब माझं मंदीवर चांगले संस्कार केले असल्याने आमच्या डोक्याला असला ताप नाही… आता घरी जाऊन आमच्या हिला हे सांगायला हवं.. या आर. टी. ओ. च्या आपली सुरक्षा आपल्या हाती या अभियानाचा हेल्मेट वापराचा सक्तीचा कायदा लागू केला त्यामुळे आपल्याला आपल्याच माणसांची ओळखच पटत नाही… आता हेच बघाना त्या मुलीने पण आमच्या मंदी सारखाच ड्रेस घातलाय कि.. मग मंदी तर नसेल… छे छे डोक्याचा पार भुगाच होऊन राहिलाय… “

“अगं मंदे काय तुझा बाप गं!… त्याच्या समोरून निघून पुढे आलो तर डोक्यात शंकेचं वारूळातला भुगा ऊकरत बसलाय… बघितलसं आपण दोघांनी हेल्मेट घातल्यामुळे तो कनफ्युज कसा झालाय… आज जर आपण हेल्मेट घातलं नसतं, तर आपल्या दोघांची चेकमेटच त्यांने केली असती.. लग्न गाठी स्वर्गात ठरतात ना त्याच्या ऐवजी. मग आपली हेल मेट नक्कीच ठरली असती.. “

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्रतोपासना – ७. कोणत्याही ऋतूची निंदा करु नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

व्रतोपासना – ७. कोणत्याही ऋतूची निंदा करु नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

जसे आपण काही व्रत कथा वाचल्या की, त्यात प्रथम लिहिलेले असते ‘उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको. ‘ त्याच प्रमाणे कोणती व्रते करावीत हे आपण बघत आहोत. ही व्रते जुनीच आहेत फक्त काळानुसार आपण त्यात थोडा बदल करुन अंमलात आणावे.

वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर अशा सहा ऋतूंनी आपले संवत्सर पूर्ण होते. आणि हे ऋतूचक्र अव्याहत चालू असते. त्या मुळेच संपूर्ण जीवसृष्टीला, माणसाला जगण्यासाठी आवश्यक गोष्टी मिळतात. कधी कधी काही ऋतूंचा त्रास होऊ शकतो. पण तो काही जणांनाच होतो. काहींना ऋतू बदलाचा पण त्रास होतो. या बदलाच्या काळात काहींना आरोग्याशी संबंधित समस्या येऊ शकतात. पण त्यात ऋतूंचा दोष नसतो. आपली प्रत्येकाची प्रकृती भिन्न असते. त्या नुसार आपल्याला त्रास होतात. पण आपण आहार, विहार, विश्रांती, यात ऋतू प्रमाणे बदल करुन कधी आवश्यक ती औषध योजना करुन हे त्रास, आजार नियंत्रित करु शकतो. परंतू या कोणत्याही ऋतूंची निंदा करणे योग्य नाही.

आपण निसर्गा कडे बघितले की निसर्ग प्रत्येक ऋतुशी कसे जमवून घेतो, पशुपक्षी कसे जमवून घेऊन राहतात हे समजते. आणि कोणत्याही परिस्थितीत आनंदी कसे रहायचे हे शिकवतात. एक माणूसच असा आहे की आनंद शोधण्या पेक्षा दु:ख शोधत रहातो. आपल्याला जर कोणी आठवणी विचारल्या किंवा लिहायला सांगितल्या तर आनंदी प्रसंग फार कमी समोर येतात. आणि अवघड, दुःखाचे प्रसंग जास्त आठवतात. ही सवय जर आपण बदलू शकलो तर आपण कायम आनंदात राहू शकतो. हेच ऋतूंच्या विषयी करायचे. प्रत्येक ऋतुतील आनंद शोधायचा. आयुर्वेदिक औषधे देणाऱ्यांना या ऋतूंचे खूप महत्व असते. आपली संस्कृती, आपले सण समारंभ बघितले तर त्यात निसर्गाचेच पूजन दिसते. आपल्या पूर्वजांनी सगळे सण व त्यातील आहार, पूजा, व्रते त्या त्या ऋतू नुसार ठरवलेली होती. ऋतू बदलतात म्हणून तर आपल्याला विविध फळे, फुले यांचा आस्वाद घेता येतो. आणि अनेक प्रकारची धान्ये, भाज्या मिळतात. हा सर्व विचार करून विविधता देणाऱ्या ऋतूंचा सन्मान करु या. आणि या ऋतूंची निंदा बंद करु या.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

९/११/२०२४

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares