मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘बलस्य मूलं विज्ञानं’ …युवा प्रताप ☆ माहिती संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘बलस्य मूलं विज्ञानं’ …युवा प्रताप ☆ माहिती संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

महिन्यातून अठ्ठावीस दिवस विदेशांचा प्रवास करणारा हा अवघे २१ वर्षांचे वय असलेला युवा आहे प्रताप.

फ्रान्सने त्याला त्यांच्याकडे नोकरी करण्याचे निमंत्रण दिले आहे.

मासिक सोळा लाखांचा गलेलठ्ठ पगार, पाच शयनकक्षांचे घर, अडीच कोटींची दिमाखदार कार, अशा प्रलोभनपूर्ण प्रस्तावांनी अनेक संस्थांनी त्याला बोलावले. ह्या पठ्ठ्याने या सर्वांना सरळ नकार दिला.

आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी त्याला बोलावून घेतले, उचित पारितोषकाने त्याचा सत्कार केला आणि ‘डी आर डी ओ’ मध्ये त्याला सामावून घेण्यास सांगितले.

या कर्नाटकातील मुलाने काय नेमके पटकाविले आहे ते पाहूयात.

पहिला भाग :-

कर्नाटकातील मैसूर जवळ कोडाईकुडी नावाच्या एका दुर्गम खेड्यात याचा जन्म झाला. त्याचे शेतकरी वडिल सुमारे दोन हजार रुपये कमवू शकत. 

याला बालपणापासूनच ‘इलेक्ट्रॉनिक्स’ मध्ये विशेष रस. हा प्रताप बारावीत शिकत असताना आसपासच्या सायबर कॕफेंच्या माध्यमातून त्याचा बोईंग ७७७, रोल्स रॉईस कार, अवकाश, हवाई प्रवास, अशा गोष्टींशी परिचय झाला. याने जगभरातील अनेक शास्त्रज्ञांना याच्या मोडक्या तोडक्या इंग्रजीत शेकडो इमेल लिहिले आणि कळविले की त्याला काम करायचे आहे पण कसचे काय अन् कसचे काय कुणीच दखल घेतली नाही.

प्रतापला खरेतर इंजिनियरिंग कॉलेज मध्ये शिकावे वाटत होते परंतु हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याने बी एससी (फिजिक्स)ला प्रवेश घेतला. हे ही त्याला सोडून द्यावे लागले. त्याला वसतीगृहाचे शुल्क भरता आले नाही म्हणून हाकलून देण्यात आले. तो मैसूर बसस्टँडवर झोपायचा आणि सार्वजनिक स्वच्छतागृहात कपडे धुवायचा. त्याने एकलव्याप्रमाणे सी प्लस प्लस, जावा कोअर, पायथॉन या संगणक भाषा स्वतःच शिकल्या. अशातच त्याला ई वेस्टपासून ड्रोन बनविण्याबद्दल कळले. सुमारे ऐंशीवेळच्या  खटपटींनंतर त्याला असा ड्रोन बनविण्यात यश आले.

दुसरा भाग :-

आय आय टी दिल्ली मध्ये ड्रोन स्पर्धा आयोजित केली होती. प्रताप तिथे भाग घेण्यासाठी विना आरक्षित डब्यातून प्रवास करीत, त्याच्या गावरान कपड्यात, पोहोचला. त्याने दुसरे पारितोषक पटकावले.

त्याला सांगितलं गेलं की जपान मध्ये एक स्पर्धा आहे व त्याने त्या स्पर्धेत भाग घ्यावा.

जपानच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी चेन्नईच्या एका महाविद्यालयातील प्राध्यापकाने त्याच्या शोध निबंधाला मान्यता देणे आवश्यक होते.

हा चेन्नईला प्रथमच जात होता. महत्प्रयासाने प्राध्यापक महाशयांनी त्याच्या निबंधाला काही शेरे देऊन मान्यता दिली. शेऱ्यात त्यांनी लिहिले कि शोध निबंध लिहिण्याची अर्हता याच्यापाशी नाहीय. प्रतापला जपानला जाण्यासाठी साठ हजार रुपयांची गरज होती. मैसूर मधील एका भल्या माणसाने त्याच्या तिकिटाची व्यवस्था केली. बाकीचे पैसे शेवटी प्रतापच्या आईच्या मंगळसूत्राच्या विक्रीतून उभे केले. त्याच्या पहिल्यावहिल्या विमान प्रवासाने प्रताप एकटाच टोकियोला पोहोचला. उतरला तेव्हा तिथल्या खर्चासाठी त्याच्यापाशी उरले होते केवळ चौदाशे रुपये. महाग असल्यामुळे त्याने बुलेट ट्रेनचे तिकिट काढले नाही आणि नियोजित गावापर्यंत पोचण्यासाठी सोबतच्या सामानासह त्याने सोळा ठिकाणी ट्रेन बदलत साध्या ट्रेनने प्रवास केला. स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रताप आणखी आठ किलोमिटर सर्व सामान घेऊन पायी चालत गेला. एकशे सत्तावीस देशांचे स्पर्धक असलेल्या त्या महाप्रदर्शनात शेवटी त्याने भाग घेतला. निकाल गटागटाने आणि वरचे दहा क्रमांक राखून जाहीर होत होते.

प्रताप हळुहळू हताश होत मागे सरकत होता.  निकाल जाहीर करणारे हळुहळू पहिल्या दहातील निकाल सांगत होते. सरकत सरकत तिसरा क्रमांक घोषित झाला. मग दुसरा… आणि घोषणा झाली ‘ आता स्वागत करूयात भारतातून आलेल्या सुवर्णपदक विजेत्या श्री. प्रताप यांचे ‘ … त्याच्या डोळ्यात आनंदाश्रूंनी गर्दी केली. तो डोळ्यांनी पहात होता अमेरिकेचा ध्वज खाली खाली सरकत आहे आणि भारताचा तिरंगा डौलाने वर वर सरकत आहे. प्रताप दहा हजार डॉलर्सनी सन्मानित केला गेला. सर्वत्र सत्कार समारंभ होऊ लागले. 

त्याला मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींचा फोन आला. सर्व आमदार खासदारांनी सन्मान केला. फ्रान्सने त्याला मोठी नोकरी आणि मानपानाची साधने प्रस्तावित केली. प्रतापने फ्रान्सला सरळ नकार दिला. 

आणि आता मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी त्याला बोलावून घेतले आहे आणि (डी आर डी ओ)  “रक्षा अनुसंधान एवं विकास संगठन”  मध्ये त्याला सामावून घेतले आहे

…भारतीय ‘बलस्य मूलं विज्ञानं’ चे व्रत घेऊन भारतमातेची सेवा करण्यासाठी…

माहिती प्रस्तुती : श्री अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ असाही व्हॅलेंटाईन… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ असाही व्हॅलेंटाईन… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

मित्राची घट्ट मिठी

तोंडातून कच्चकन शिवी

आणि पाठीवर बुक्की

गच्च दोस्ती, घट्ट प्रेम.

व्हॅलेंटाईन … ‍❤️

बाबांची घट्ट मिठी

ऐकायचे त्यांचे काळीज ठोके

न बोलताही ऐकू येते ते प्रेम.

व्हॅलेंटाईन … ‍❤️

संध्याकाळी दिवेलागणीला

ओसरीवर आज्जीसोबत

करुणाष्टके म्हणून झाल्यावर

तिला नमस्कार करताना

तिचा खरबरीत सुरुकुतलेला हात

माझ्या डोक्यावर विसावतो

केसांमधून फिरतो

दाट मऊसर ते कापूसप्रेम.

व्हॅलेंटाईन … ‍❤️

आईची साद येते

मी कुठे तरी आपल्याच तंद्रीत

लक्षातच येत नाही आईची साद

घरी पोहोचायला उशीर होतो

पेंगुळल्या डोळ्यांची

आई असते उंबरठ्यावर बसलेली

पेंगुळल्या आवाजातच म्हणते,

आलास तू. किती वाट बघायला लावतोस रे, काळजी वाटते बघ

पेंगुळल्या डोळ्यातले प्रेम

उंबरठ्यावर सडा पसरलेले.

व्हॅलेंटाईन … ‍❤️

बहिणीचा फोन

दादा, कुठे आहेस ? अरे गाढवा काल येतो म्हणालायस आणि अजून येतोयस ? बावळट आहेस तू. झरझरुन फोनवर तिचे हसणे. मी मारलेल्या थापा ओळखणे. आणि दुसऱ्या दिवशी भेटल्यावर घट्ट मिठीत घेऊन, दाद्या, तू आहेस म्हणून मी आहे रे … पाणावलेले डोळे हळूच पुसत हसताना माझ्या अंगभर पसरणारे तिचे प्रेम.

व्हॅलेंटाईन … ‍❤️

मुलाशी भांडण

मग न बोलता जेवण पान लावून सुम्म बसणं बातम्या संपल्या की झोपायला जाणं झोपल्यावर रात्री कधीतरी जाग येते. अंगावर शाल पसरलेली असते. पायावर कुणाचा तरी हात असतो. उठून बघतो तर मुलगा तसाच बसून माझ्या अंगावर हात ठेवून गाढ झोपलेला असतो. डोळ्यातले पाणी गालावर सुकलेले. मी त्याच्या केसांत हात फिरवून त्याला जागं करतो. तो जागा होतो. आणि घट्ट मला मिठी मारतो. हुंदक्यांना आवरत तो म्हणतो,” बाबा, आय ॲम सॉरी. माझ्याकडून परत असं होणार नाही. पण बोल रे माझ्याशी ” मी ही त्याला म्हणतो, “आय ॲम सॉरी मित्रा. माझंही जरा चुकलंच रे ” घट्ट मिठीत आश्वासक प्रेम.

व्हॅलेंटाईन … ‍❤️

मुलीचा कॉलेजमधे कसला तरी सत्कार असतो.  बाबा, तू यायलाच हवायस हं ” मी आणि बायको जातो. मुलगी तिच्या तिच्या मित्र मैत्रिणींच्या गोतावळ्यात असते. आमच्याकडे बघते आणि तिच्या नजरेत हसरी चमक उठते. कार्यक्रम सुरु होतो. ती स्टेजवर असते. बक्षिस मिळते. ती माईक हातात घेते. “माझ्या या बक्षिसाचे खरे मानकरी आहेत माझे आई-बाबा.” आमच्याकडे खूण करते. सगळे अॉडिटोरियम आम्हां दोघांकडे बघायला लागते. टाळ्यांचा आवाज वाढत असतो. स्टेजवर असलेली ती आमच्याकडे बघत आपले डोळे पुसत असते. आमचेही डोळे भरलेले. भरुन भरुन ओसंडणारे प्रेम.

व्हॅलेंटाईन … ‍❤️

सिग्नलला गाडी थांबलेली… सोनचाफ्याची फुले विकणारी ती झिप्र्या केसांनी विस्कटलेली गाडीच्या काचेजवळ. मी गाडी बाजूला घेऊन थांबवतो. बाहेर येऊन तिच्याकडून दोन पाकिटे फुले घेतो. पन्नासच्या ऐवजी शंभर देतो. आणि फुलांची पाकिटे उघडून ती सगळी फुले तिच्याच ओंजळीत ओततो. ती श्वास भरुन गंधाळली होते. सोनचाफी गंधाळ हसत हसत निघून जाते. ती गेलेल्या वाटेवर पसरलेले असते ते सोनचाफी गंधाचे निर्व्याज अनामिक प्रेम.

व्हॅलेंटाईन … ‍❤️

वृध्द ओणव्या झालेल्या वडाच्या पारावर संध्याकाळी ती काळपट म्हातारी बसून असते. काळ्याशार अंधारात मिसळलेली. डोळ्यांतले दिवे मंदावलेले. गार वाऱ्यात थरथरणारी. रात्री तिच्यासाठी पारावर जेवणाचे ताट येते. ताट विस्कटत ती कशीबशी चार घास खाते आणि तशीच लवंडते. कुणीतरी तिच्या अंगावर धाबळी ठेवतंय. ती झोपेतच गालातल्या गालात हसते. सकाळी पारावरुनच ती अनंताच्या प्रवासाला निघून गेलेली असते. रात्रीचे हसू तिथेच पारावर त्या वृध्द ओणव्या झालेल्या वडाला भेट देऊन व्हॅलेंटाईन डे ची. 

व्हॅलेंटाईन असा ही….

लेखक : अज्ञात 

संग्राहक  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझी मराठी भाषा ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

🔅 विविधा 🔅

माझी मराठी भाषा ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

आपण राहात असलेल्या महाराष्ट्र प्रांतातील आपली मराठी ही प्राचीन प्राकृत भाषा आहे. ती केव्हापासून बोलली जाऊ लागली हे माहित नसले तरी सहाव्या शतकातील राष्ट्रकूटांच्या राजवटीपासून ती बोलली जाऊ लागली असा अंदाज आहे.

श्रवणबेळगोळ येथील नवव्या शतकातील बाहुबलीच्या शिल्पाच्या  पायावर “ चाविंडराये करवियले ” हे  कोरलेले वाक्य सर्वात  जुने व पहिले मराठी लेखन असावे. तेव्हापासून ते बाराव्या शतकापर्यंत अपभ्रंश मराठी बोलली जात होती.

अकराव्या शतकातील महानुभाव पंथातील चक्रधरस्वामींवर मुकुंदराजाने लिहिलेला लीळाचरित्र हा मराठीतील आद्य ग्रंथ होय.

मित्रांनो, महाराष्ट्राची ओळख ही राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा अशी आहे. अशा या आपल्या प्रांतातील आपली भाषा ही तितकीच रोखठोक, रांगडी तरीही मृदु मुलायम आहे. तलवारीच्या पात्याच्या तेजाची धार असलेली तरीही माणुसकीचा पाझर दगडा दगडांतून स्त्रवणारी ही मराठी माझी माय जणू दुधावरची साय.

शतकानुशतके शेतात घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याने, अटकेपार झेंडा रोवणाऱ्या मराठा योध्यांचे पोवाडे गाणाऱ्या शाहिरांनी, ढोलकीच्या तालावर थिरकणाऱ्या लावणीने, गावगाडा हाकणाऱ्या बारा बलूतेदारांनी ही आपली मायबोली समृद्ध केली आहे.

महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्याने मराठी भाषा विठ्ठलाच्या भक्तिरसाने समृद्ध होत गेली आहे. ज्ञानेश्वरांच्या ओवी  , तुकारामांचे अभंग जनमनाच्या ओठी बसले. एकनाथी भागवत, मोरोपंतांची केकावली, केशवसुतांची तुतारी, पठ्ठेबापूरावांपासून ते आजपर्यंतची जगदीश खेबुडकरांची लावणी परंपरा, राम गणेश गडकरीपासूनची नाट्य परंपरा, त्या अगोदरची संगीत नाटके, प्रल्हाद केशव अत्रेंचे कऱ्हेचे पाणी, साने गुरूजींची श्यामची आई, कुसुमाग्रजांची विशाखा, मराठीचे सौंदर्य खुलतच गेले.

खान्देशातील अहिराणी, कोकणातील कोकणी, विदर्भातील वऱ्हाडी प्रांता प्रांतातील वेगवेगळा बाज असलेली मराठी, ई लर्निंगच्या जमान्यातही तितकीच सुंदर, ताजी व टवटवीत आहे. इंग्रजीतही सांगितले की My Marathi तरीही ती माय मराठीच उरते. ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे,

  माझिया मराठीचे बोलू कवतिके।

  अमृताते पैजा जिंके.।

                         अशीच आहे.

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. -९८२२८५८९७५ , ईमेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खेळ आवरायला हवा… — ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ खेळ आवरायला हवा… — ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

आद्या आणि डॉली भातुकली खेळत होत्या. खेळून झाल्यावर त्यांनी सगळा खेळ आवरून नीट खोक्यात भरून ठेवला, नीट सगळं आवरलं, प्लेरूम स्वच्छ केली आणि मग अभ्यासाला बसल्या. मी लांबूनच त्यांचा खेळ बघत होते. मनात विचार आला, ‘ किती रंगून जाऊन या मुली खेळत होत्या आणि कंटाळा आल्या बरोबर त्यांनी सगळा खेळ आवरून टाकला.’ 

मग माझ्या मनात असा विचार आला, की ‘ आपण कधी शिकणार असा खेळ आवरायला? चार बुडकुली आणि तीन छोट्या खोल्यात सुरू केलेला संसार आता मोठ्या बंगल्यात आला. तरी आपले अजून भातुकली खेळणे सुरूच आहे की. भातुकलीची भांडी बदलली, खेळाचा पसारा वाढला. खेळगडीही बदलले. तरीही आपण अजूनही त्यातच रंगलो आहोत. वयाची साठी केव्हाच ओलांडून गेली. आता नव्या दमाचे  खेळाडू हा खेळ खेळायला सज्ज झालेत आणि उत्सुकही आहेत. हा खेळ आता देऊया ना त्यांच्या हातात. खेळत असताना आद्याने कुठे मला विचारले, “ आजी मी आता कशी खेळू?”  तिला हवा तसा ती खेळ मांडत होती, मोडत होती, पुन्हा नवीन रचना करून बघत होती.  तिला माझी मदत नको होती. आपणही आता हा डाव आपल्या मुलांच्या हाती देऊया. त्यांना हवी तशी ती त्यांच्या मनाप्रमाणे खेळतील. नव्या रचना करतील, नवे डाव  मांडतील. आपण नको त्यात हस्तक्षेप करायला.  चुकतील, धडपडतील पण कधीतरी बरोबर जागा मिळेलच की त्यांना. आपण आता नको त्यात पडायला. अनुभवाने होतीलच की तीही शहाणी. तो वर बसलेला परमेश्वर आपला हा भातुकलीचा डाव अर्धवट सोडायला लावून कधी आपल्याला हाक मारेल, सांगता येतंय का? आपण आपले आधीच आपलीही खोकी भरून तयारीत असलेले बरे.  कोणी गरजवंताने जर नवा खेळ मांडला असेल तर त्यालाही देऊया ना आपली चार भांडी, नको असलेले पण उत्तम स्थितीतले कपडे, पुस्तके, फर्निचर. नको आता हा ‘अती’चा हव्यास.त्यांनाही मिळू दे खेळ खेळण्यातला आनंद. जुनी ओझी आता नकोत कवटाळायला.’ 

कितीतरी घरातले पक्षी दूरदेशी उडून गेलेत, त्यांना तुमच्या जुन्यापुराण्या वस्तू आणि भांड्याकुंड्याची, अवजड फर्निचरची आणि कशाचीच अजिबात गरज नाहीये. तर मंडळी, आवरता घ्या हा पसारा  खेळ आवरा आणि त्या वरच्या नवीन घराचे कधी बोलावणे येईल तेव्हा हसतमुखाने त्याच्या घरी जायला सज्ज व्हा….. रिकाम्या हाताने .. आणि मनानेही.

खरंच हा खेळ वेळेवर आवरायला हवा …. बघा पटतेय का ? 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

आयुष्य म्हटलं की कष्ट आले, त्रास आला , मनस्ताप आला ,भोग आले आणि जीव जाईपर्यंत काम आलं…मग ते घरचं असो नाहीतर दारचं…. बायकांना तर म्हातारपणापर्यंत कष्ट करावे लागतात…

75 वर्षाच्या म्हातारीने पण भाजी तरी चिरुन द्यावी अशी घरातल्यांची अपेक्षा असते….ही सत्य परिस्थिती आहे…..आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत हे रहाणारच……

त्यामुळे ही जी चार भांडीकुंडी आपण आज नीटनेटकी करतो…ती मरेपर्यंत करावी लागणार…

ज्या किराणाचा हिशोब आपण आज करतो तोच आपल्या सत्तरीतही करावा लागणार….

” मी म्हातारी झाल्यावर ,माझी मुलं खूप शिकल्यावर त्याच्याकडे खूप पैसे येतील .. मग माझे कष्ट कमी होतील ” * ही *खोटी स्वप्न आहेत….

मुलं , मुली कितीही श्रीमंत झाले तरी ..” आई बाकी सगळ्या कामाला बाई लाव पण जेवण तूच बनव..”

असं म्हटलं की झालं… पुन्हा सगळं चक्र चालू ..

आणि त्या चक्रव्युहात आपण सगळ्या अभिमन्यी….,

पण..पण ..जर हे असंच रहाणार असेल… जर परिस्थिती बदलू शकत नसेल तर मग काय रडत बसायचं का ??

तर नाही…..

परिस्थिती बदलणार नसेल तर आपण बदलायला हवं…..

मी हे स्वीकारले आहे …. खुप अंतरंगातून आणि आनंदाने….

माझा रोजचा दिवस म्हणजे नवी सुरुवात असते….. खुप उर्जा आणि उर्मीनी भरलेली……

सकाळी सात वाजता जरी कुणी मला भेटलं तरी मी तेवढ्याच उर्जेनी बोलू शकते आणि रात्री दहा वाजता ही….. आदल्या दिवशी कितीही कष्ट झालेले असू देत….दुसरा दिवस हा नवाच असतो….

काहीच नाही लागत हो… हे सगळं करायला…..

रोज नवा जन्म मिळाल्यासारखं उठा… छान आपल्या छोट्याश्या टेरेसवर डोकावुन थंड हवा घ्या..आपणच प्रेमाने लावलेल्या झाडावरून हात फिरवा….आपल्या लेकीला झोपेतच जवळ घ्या..

इतकं भारी वाटतं ना….

अहाहा…..

सकाळी उठलं की ब्रश करायच्या आधीच रेडिओ लागतो माझा…अभंग ऐकत ऐकत मस्त डोळे बंद करून ब्रश केला….ग्लास भरुन पाणी प्यायलं आणि मस्त…आल्याचा चहा पीतपीत खिडकी बाहेरच्या निर्जन रस्त्याकडे बघितलं ना की भारी वाटतं …..

रोज मस्त तयार व्हा….

आलटुन पालटुन स्वतःवर वेगवेगळे प्रयोग करत रहा ….

कधी हे कानातले ..कधी ते गळ्यातले…..कधी ड्रेस…कधी साडी…. कधी केस मोकळे…कधी बांधलेले….

कधी ही टिकली तर कधी ती…. रोज नवनवीन साड्या … एक दिवसाआड केस मोकळे सोडलेले….स्वत:ला बदला…. जगाशी काय करायचं आहे…दुनीयासे हमे क्या लेना …. तुम्ही कसेही रहा .. जग बोंबलणारच……

सगळं ट्राय करत रहा….नवं नवं नवं नवं….. रोज नवं…..रोज आपण स्वतःला नवीन दिसलो पाहिजे….

स्वतःला बदललं की…. आजूबाजूला आपोआपच सकारात्मक ऊर्जा पसरत जाईल……..तुमच्याही नकळत……आणि तुम्हीच तुम्हाला हव्या हव्याशा वाटू लागाल……

मी तर याच्याही पार पुढची पायरी गाठलेली आहे….

माझ्याबद्दल नकारात्मक कुणी बोलायला लागलं की माझे कान आपोआप बंद होतात….काय माहित काय झालंय त्या कानांना….

आता मी कितीही गर्दीत असले तरी मी माझी एकटी असते…. मनातल्या मनात मस्त टुणटुण उड्या मारत असते…..

जे जसं आहे….ते तसं स्विकारते आणि पुढे चालत रहाते…

कुणी आलाच समोर की..” आलास का बाबा..बरं झालं “..म्हणायचं… पुढे चालायचं….

अजगरासारखी सगळी परिस्थिती गिळंकृत करायची….

माहीत आहे मला… सोपं नाहीये…. पण मी तर स्विकारले आहे….. आणि एकदम खुश आहे….

आणि म्हणूनच रोज म्हणते….

” एकाच या जन्मी जणू .. …फिरुनी नवी जन्मेन मी…

हरवेन मी हरपेन मी…. तरीही मला लाभेन मी…..”

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अधिक” देखणे ☆ श्री श्रीनिवास गोडसे ☆

श्री श्रीनिवास गोडसे

? विविधा ?

☆ “अधिक” देखणे ☆ श्री श्रीनिवास गोडसे ☆

(२९ फेब्रुवारी विशेष)

1974-75 चा काळ असावा… मी सात वर्षांचा होतो. संक्रांतीचा दिवस… सगळ्या गल्लीतली मुलं मिळून तिळगुळ वाटायला बाहेर पडली होती… प्रत्येकाच्या घरात तिळगुळ द्यायचा… राम मंदिर, महादेव मंदिर, विठोबा मंदिर, अंबाबाई चे मंदिर… सगळी देवळं… सगळीकडे तिळगुळ वाटला.. ठेवला.. आता शेवट ‘ऐतवडे डॉक्टर!’…  मग झेंडा चौकाकडे मोर्चा वळला… चौकात एका गल्लीत डॉक्टरांचा दवाखाना…

दवाखाना माडीवर…

एका लायनीत उभं राहून डॉक्टरांना तिळगूळ दिला… डॉक्टरांनी पण आम्हाला तिळगूळ दिला अन वर एक चॉकलेट…

कित्ती मज्जाss!…

रावळगाव चॉकलेट…

त्यानंतर मात्र दरवर्षी संक्रांतीला ऐतवडे डॉक्टरांचा दवाखाना ठरलेला… डॉक्टरही नेमाने प्रत्येक वर्षी मुलांना चॉकलेट वाटत राहिले… आणि प्रत्येक मुलांच्या लक्षात राहिले… कायमचे…

आजही कधी कधी झेंडा चौकातल्या त्यांच्या गल्ली जवळून गेलो तरी डॉक्टरांची आठवण नक्की होते… खरंतर ते काही आमचे फॅमिली डॉक्टर न्हवते… मी कधीच त्यांच्याकडे कुठल्याही उपचाराला गेलो नाही… तरीही ऐतवडे डॉक्टर हा शब्द जरी ऐकला तरी तीळगूळ आणि त्यांचे ते चॉकलेट यांची आठवण नक्कीच होते…

डिसेंबर चे दिवस..

लुधियाना ला गेलो होतो… अमृतसर कडे निघालो तेव्हा लुधियाना मध्ये पहाटे एका गुरुद्वारात गेलो होतो… रात्रभर गुरुवाणी चा कार्यक्रम चालू होता… पहाटेची वेळ… डिसेंबरची थंडी… भव्य गुरुद्वारा सजला होता … रोषणाई केली होती… त्या दिवशी काहीतरी विशेष कार्यक्रम असावा… भजन ऐकत भक्तगण बसलेले… चकचकीत वातावरण… ग्रंथसाहेब…

पंजाबी भजनातील बरेच शब्द ओळखीचे… खिशातील मोबाईल काढून समोर ठेवून एका कडेला बसलो… दहा मिनिटे होती पुढे जाण्यासाठी… एक वयस्क पंजाबी स्त्री , पांढरी सलवार-कमीज पंजाबी परिधान,.  चेहऱ्यावरती हास्य… झाडू काढत होती… झाडू काढताना लोक उठत आणि दुसरीकडे बसत… तीही आनंदाने सेवेत मग्न होती… तिची स्वच्छता आमच्यापर्यंत आली आणि मी उठलो… गुरु ग्रंथ साहेबांना प्रणाम करून आमच्या गाडीकडे निघालो… गुरुद्वाराच्या दारात येताच

 ” भैय्या ss!”

अशी हाक ऐकू आली, पाहिले तर ती मगासची स्त्री.. हसत सामोरे आली ,

हातात मोबाईल..!  मला देऊन म्हणाली

“आपका मोबाईल..! भूल गये थे !”

माझ्या आता लक्षात आले मी माझा मोबाइल बसल्या जागीच विसरलो होतो..

 मी वाकून नमस्कार केला… त्या हसल्या… स्वेटरच्या खिशात हात घालून त्यांनी काहीतरी काढले … माझ्या हातात ठेवले…

मी पाहिलं तर दोन चॉकलेट !..

मी पण हसलो…

पुन्हा पुन्हा धन्यवाद मानत बाहेर पडलो…

कोण कुठची ती स्त्री, पण आठवणीत कायमची जागा करून गेली…!  पुढचा सर्व दिवस असाच मजेत गेला … अमृतसरला पोहोचलो.. सर्व अमृतसर फिरलो … सायंकाळी वाघा बॉर्डर पण पाहिली… सांगण्यासारख आणि लिहिण्यासारखे भरपूर घडले त्या दिवशी … पण सकाळी झालेला तो प्रसंग.. झालेली ती छोटी घटना मात्र आज तेजस्वी झाली आहे…

मागच्या महिन्यातली गोष्ट आम्ही दोघ गाडीवरून मुलीच्या पालक मिटींगच्या निमित्ताने कोल्हापूरला गेलो होतो… सगळा कार्यक्रम आणि कोल्हापुरातले काम व्हायला दुपारी दोन वाजून गेले होते…वाटेत काही तरी खाऊ आणि मग पुढे घरी पोहोचू असा विचार करून निघालो… शिरोली ओलांडले अन एका राजस्थानी ढाब्यावर गाडी थांबवली …

 छान स्वच्छ परिसर …

आम्ही बसताच वेटरने पंखा चालू केला.. पाणी आणून दिले… स्वतः मालक उठून आला… आमच्यासमोर मेनू कार्ड ठेवले…  त्याला थाळीची ऑर्डर दिली… छान हसून तो आमची खातरदारी करत राहिला… गरमागरम जेवण वाढत राहिला… चेहऱ्यावरचे हास्य कायम ठेवून… व्यापारी हिशोब, रितरीवाज बाजूला ठेवून… जेवण झाले, पैसे दिले..

“वापस आना जी ss ! “

म्हणून त्याने हसूनच निरोप दिला

ह्या घटना लक्षात राहिल्यात,  त्याचे आश्चर्य वाटते.

थोडा शोध घेतला तेव्हा या तिन्ही घटनांमधील प्रत्येकाने काही जी कृती केली होती त्याचा बोध लक्षात आला… या घटनांमध्ये प्रत्येकाने स्वतःहून आनंदाने काहीतरी जास्तीचे दिले होते… जगनियम हा असा आहे

“जेवढ्यास तेवढे”

पण इथे मात्र सर्वजण स्वतःहून जास्तीचे जगाला देत होते.. अपेक्षे पेक्षा थोड जास्तच.. या गोष्टी करता त्यांनी जास्त मेहनत सुद्धा घेतली नाही…

कुठे चॉकलेट मिळाली…

कुठे आपुलकीचे दोन शब्द…

कुठं चेहऱ्यावरचे निर्मळ हास्य.. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते त्यांनी सुखासमाधानाने दिले होते.. अपेक्षा नसताना मिळाले होते..

माझी मुंबईची आत्या… अशीच प्रेमळ… मुंबईत एका चाळीत तीच घर… तीनच खोल्या … घरची आठ-दहा माणसे…आणि आला-गेला असायचा. सगळ्यांचे करत राहायची. माणूस निघताना घरातील जे काही असेल ते देत राहायची.  तिला सगळे माई म्हणायचे …किती गोड बोलणे !… तिने गोड बोलणं कधीच सोडलं नाही …

आज ती नाही.. पण तिचा सुहास्य चेहरा जसाच्या तसा फोटो काढल्या सारखा मनासमोर दिसत राहतो …एक प्रसन्न शांतता… एक प्रसन्न सोज्वळपणा याशिवाय काहीही आठवत नाही…

प्रत्येक वाक्यानंतर बऱ्याच वेळा ती होss लावायची

जेव होss!

जाऊन ये होss!

पुन्हा ये हो ss!

असे होss! बोलणे पण मी आजकाल कुठेही बघितले नाही.

प्रत्येकजण अशा गोड शब्दांना भूकावला आहे…

शरीरासाठी आपण बरेच काही करतो… पण मनासाठी काय ? गोड शब्द ही मनाची गरज आहे…

सकारात्मक शब्दांना लोक आसुसले आहेत.

ते मिळाले तर.?..

कुसुमाग्रजांची जन्मतिथी आपण नुकतीच साजरी केली… गेल्या पावसाळ्यात आपण सर्वांनीच महापुराचा कहर अनुभवलाय… लोकांना पैशाची , वस्तूची मदत तर सर्वांनी दिली असेल पण उभारी चे दोन शब्द… ते कुठे मिळतात ?

कुसुमाग्रजांकडे असाच एक जण जातो. आपली कहाणी सांगतो. त्यानंतर जे काही घडले ते त्यांच्या कवितेतच वाचा…!

कणा –

‘ओळखलत का सर मला?’ – पावसात आला कोणी,

कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :

‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,

मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,

प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे

पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला

‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा’!

माणूस आपुलकी पासून पारखा झाला आहे, शब्दांना महाग आहे…

सर्व जगच “Extra” चे वेडे आहे. डिस्काउंट, सेल, अमुक % एक्स्ट्रा, असं म्हटलं की डोळे Extra मोठे होतात. दिल्यापेक्षा आले जास्त तर सगळ्यांनाच पाहिजे असते. आपण जर असे Extra दिले तर सगळे तुमचे नक्की ‘फॅन’ होतील.

मदत असे म्हटले…

दान असे म्हटले की आपल्याला फक्त पैसा आठवतो.. . आपण याच्या पुढचा विचारच करत नाही.

 तेजगुरु सरश्रींच्या पुस्तकात वाचले त्याप्रमाणे आपणाकडे देण्यासारखे बरेच काही आहे. ते आपण देत नाही…

बाकी सगळे जाऊदे पण आपल्या आसपासचे लोकच असे आहेत…

कदाचित तुम्ही स्वतः आहात… ज्याला सकारात्मक शब्द हवे आहेत…

ज्याला कोणाचा तरी प्रेमाचा स्पर्श पाहिजे आहे…

त्याला कोणीतरी फक्त जवळ बसायला पाहिजे आहे…

ज्याला कुणाला तरी आपल्या मनातील सगळं सांगायचं आहे… त्याला श्रमाची मदत पाहिजे आहे… हात पाहिजे आहेत…

पाठीवर थाप पाहिजे आहे…

आपण शोध घेऊया..

मला स्वतः ला कशाची गरज आहे ?

आणि माझ्या आसपासच्या लोकांनाही कशाची गरज आहे?

कुणाला कान पाहिजे आहेत तर कानदान करा

कुणाला पाठीवरती थाप पाहिजे आहे त्यांना शब्ददान करा

कुणाला थोडी श्रमदानाची गरज आहे त्यांना थोडी श्रमाची मदत करा… कुणाला तुमचा वेळ पाहिजे आहे त्यांना तुमच्यातील थोडासा वेळ द्या

कुणाला फक्त तुमचे जवळ असणे पाहिजे आहे फक्त त्यांच्याजवळ फक्त बसून राहा

आपल्याकडे या सर्वात काय जास्त शिल्लक आहे ?

हे थोडेसे “एक्स्ट्रा” आपण देऊ शकतो का?

यशस्वी होण्याचा मंत्र सांगताना असे म्हणतात कि यशाकडे जाण्यासाठी पहिला तर तुमचे नियोजन करा या नियोजनाचे व्यवस्थित तुकडे करा. आपल्याला रोज थोडे थोडे काम करायचे आहे असे ठरवा. काय करायला पाहिजे आहे त्याप्रमाणे करत जा.

जमलं तर ठरवल्या्पेक्षा थोडं जास्तच करा…

‘थेंबे थेंबे तळे साचे’ ही अशीच सकारात्मक म्हण … मोठे काम करायचे असेल तर या म्हणीचा वापर करणे हाच खरा गुरुमंत्र…

आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा फक्त एक पाऊल जास्त पुढे असणे महत्त्वाचे …

रोज आपण आपल्याशी स्पर्धा केली तर?

आपणच आपले प्रतिस्पर्धी झालो तर?…

भगवान गौतम बुद्धांनी त्यांच्या साधनेच्या काळात अनेक गुरूंचा शोध घेतला. त्यांनी सत्याचा शोध घेण्याच्या मार्गात जे जे काही सांगितले त्याप्रमाणे केलेच, पण त्याच्यापेक्षाही थोडं जास्तच केले… थोडी जास्तच साधना केली … तरीही मनाची तळमळ शांत झाली नाही अखेर स्वतः मार्ग चालू लागले आणि एक दिवस अंतिम लक्ष्या पर्यंत पोहोचले…

थोडा विचार केला अन् प्रामाणिकपणाने स्वतःकडे पाहिले तर हे सर्व जण मान्य करतील की ईश्वराने आपल्याला आपल्या लायकी पेक्षाही अनेक पटीने जास्त आपणास दिले आहे… शिवाय तो देत आहे… त्याला आपण एक बीज दिले तर तो अनेकपटीने वाढवून परत देतो… भरपूर देतो… एक्स्ट्रा देतो…

तो फळ देणारा आहे …

बहुफल देणारा आहे.

माणसाने हाव सोडली तर सर्वच भरपूर आहे प्रेम ,पैसा,आनंद…

अनंत हस्ते कमलाकराने, देता किती घेशील दो कराने?

जेव्हा तो नेईल दो कराने सांभाळीशी किती मग दो कराने?

 

गदिमांच्या शब्दात आपण मिसळून जाऊया अन् देवाला मागूया… आपल्या मागण्यापेक्षा

अधिकच मिळेल!

देखणे मिळेल!

याची खात्री ठेवूनच मागूया …

 

पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी

देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी !

 

हवाच तितुका पाडी पाऊस देवा वेळोवेळी

चोचीपुरता देवो दाणा मायमाउली काळी

एक वितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी !

 

महालमाड्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया

गरजेपुरती देई वसने जतन कराया काया

गोठविणारा नको कडाका नको उन्हाची होळी !

 

सोसे तितके देई याहुन हट्ट नसे गा माझा

सौख्य देई वा दुःख ईश्वरा रंक करी वा राजा

अपुरेपणही नलगे, नलगे पस्तावाची पाळी !

 

29 फेब्रुवारी हा असाच “एक्स्ट्रा” दिवस…

आता हा दिवस चार वर्षातून एकदा येतो, सूर्याच्या भोवती पृथ्वीची सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यासाठी 365.25 (365•242181) दिवस लागतात तर आपले वर्षाचे 365 दिवस असतात राहिलेला पाव दिवस म्हणजे सहा तास

हे चार वर्षे ×प्रत्येकी सहा तास याप्रमाणे आपण एका दिवसाने वर्ष वाढवतो… त्रुटी पूर्ण करतो या सर्वच गोष्टी आपणास माहिती आहेत पण या 29 फेब्रुवारी च्या निमित्ताने मनन झाले म्हणूनच हा लेखन प्रपंच …

हे मनन आपणास आवडले असेल तर ‘पुढाळायला’ हरकत नाही आणि आपला “एक्स्ट्रा” वेळ खर्च करून प्रतिक्रिया कळवायलाही हरकत नाही… आपल्या प्रतिक्रिया ही ‘लेखकाची’ प्रेरणा आहे.

©  श्री श्रीनिवास गोडसे

इचलकरंजी, मो – 9850434741

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वृद्धाश्रम नाही… केअर सेंटर… ☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ वृद्धाश्रम नाही… केअर सेंटर… ☆ सुश्री नीता कुलकर्णी

अजूनही वृद्धाश्रम म्हटलं की गरीब  बिचारी म्हातारी माणसं…

असंच मनात येतं.

आता केअर सेंटर असे नाव दिले जात  आहे.

आणि तिथे खरंच काळजीपूर्वक वृद्धांना सांभाळलं जातं.

ते आनंदी कसे राहतील हे पण बघीतल जातं.

अशाच एका केअर सेंटरला गेले होते. इथे वृद्ध लोक काही दिवसांसाठी किंवा काही महिन्यांसाठी रहायला येतात.

काही तिथेच रहायला आले आहेत.

तिथे भरपूर झाडं होती ,कुंड्या होत्या. समोर छोट्या टेबलावर गणपतीची मूर्ती होती. हार फुलं घालून पूजा केली होती. समोर मंद दिवा तेवत होता.

 एका ओळखीच्या  आजींचा वाढदिवस होता.  आजींना भेटाव व ईतर लोकांशी बोलाव म्हणून मी थोडी आधीच तिथे गेले .

तिथल्या खोल्या बघितल्या .काॅट, कपाट, टीव्ही, फॅन, या सोयी होत्या.. काॅलेजच्या होस्टेलचीच आठवण आली.

खोल्याखोल्यातुन मी चक्कर मारली.

स्वतःचं घर असावं अशा खोल्या त्यांनी स्वच्छ ठेवल्या होत्या…

सगळे आजी-आजोबा गप्पा मारायला आपली कहाणी सांगायला उत्सुक होते…

एक एकजण सांगत होते.

“अग माझ्या दोन्ही मुली आपापल्या संसारात त्यांच्यात माझी लुडबुड नको ग …..  शिवाय संकोचही वाटतो बघ आणि  हे गेले आता एकटी कशी राहु ?म्हणून मी ईथे आले.”

“मुंबईत घर घेणं कुठे परवडतं…नातवाच लग्न झाल  म्हणून मीच म्हटलं मला इथे ठेवा….”

” मला तर मूलबाळच नाही… भाचे पुतणे करतात पण तेही आता पन्नाशी ..साठीला आले….”

” माझी नात सून नोकरी करते सुनेला तिची मुले सांभाळावी लागतात….माझं अजून एक ओझं  तिच्यावर कुठे घालू ग….”

“माझा मुलगा सून  परदेशी गेले आहेत…..लेकीच  बाळांतपण करायला..  म्हणून  काही महिन्यांसाठी मी इथे….”

एक आजोबा शांतपणे जपमाळ हातात घेऊन जप करत बसले होते.

दुसरे आजोबा सांगायला लागले..

 ” माझी  एकुलती एक मुलगी मला छान संभाळते. पण तिला चार महिन्यांसाठीऑफीसच्या कामासाठी अमेरिकेला जावे लागले म्हणून तोपर्यंत मी इथे “

प्रत्येकाकडे एक एक कारण होते…..इथे येण्याचे… मुख्य म्हणजे कोणाचाच तक्रारीचा सूर अजिबात नव्हता.

इतक्यात एक मुलगा सांगत आला 

” चला … चला खाली  तयारी झाली आहे ….”

एक आजी थोड्या भांबावलेल्या दिसत होत्या. 

“अग या कालच आल्या आहेत ” एकीनी सांगितलं 

दुसऱ्या  आजींनी त्यांचा हात धरला.. म्हणाल्या ” हळूहळू होईल तुम्हाला सवय … चला आता खाली “

असं म्हणून त्यांना घेऊन गेल्या.

खालच्या पार्किंगमध्ये सजावट केली होती .खुर्च्या मांडल्या होत्या. समोरच्या टेबलावर केक ठेवला होता.

छान  जरीची साडी नेसुन आलेल्या आजींनी केक कापला. सगळ्यांनी टाळ्या वाजवून  हॅपी बर्थडे चा गजर केला…

नव्वदीचे चे आजोबा ….  “जीवेत शरद शतम्……” असा आशीर्वाद देत होते.

डिशमध्ये सर्वांना केक वेफर्स आणि बटाटेवडे खायला दिले.

“झालं न खाणपीणं….आता गाणी म्हणायला सुरू करूया..” केअर सेंटरच्या डॉक्टरीण  बाईंनी सांगितले.

एक आजोबा पेटी घेऊन आले. टाळ, चिपळ्या आल्या गाणी सुरू झाली…..एकच घमाल सुरू झाली.

पंच्याऐंशीच्या आजी

“सोळावं वरीस धोक्याचं गं…” ठेक्यात म्हणत होत्या.

” पाऊले चालती पंढरीची वाट ” सुरू झालं ..अभंग म्हणत म्हणत सर्वांनी एक गोल चक्कर मारली.

मी प्रसन्न मुद्रेने हे सगळं बघत होते.

अध्यात्म प्रत्यक्ष आयुष्यात जगणाऱ्या या शहाण्या आजी-आजोबांना मी मनोमन साष्टांग दंडवत केला…

 वानप्रस्थाश्रम संपवून या आधुनिक संन्यासाश्रमात प्रवेश केलेले हे लोक होते…..

खरं सांगू हे वाटतं तितकं सोपं नाही…..मोह ,माया इतकी लगेच सुटत नाही…. भरल्या घरातून इथे यायचं.. फोनद्वारे कनेक्ट राहायचं आणि तरीही अलिप्त रहायचं….

आपल्या मुलांची अडचण ओळखून स्वतःहून हे सगळे  इथे आले होते…..

तरीपण…. यांच्या मनात काय काय चाललं असेल हे मला समजत होते.

फार अवघड आहे… हे सगळं स्वीकारून आनंदात राहणाऱ्या या लोकांकडून मी आज खूप काही शिकले….

वाटलं… येत जावं इथं अधून मधून…आपलेही पाय जमिनीवर राहतील…

घरात राहून आपण  छोट्या मोठ्या तक्रारी करणार नाही….

इतक्यात खणखणीत आवाज ऐकू आला…. गाऊन घातलेल्या आजी…

 ” पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा……आई मला नेसव शालु नवा…” म्हणत होत्या..

माझ्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. सगळं कसं धूसर धूसर दिसत होतं….

त्या नादमयी वातावरणाला एक कारूण्याची झालर आहे हे आतल्या आत कुठेतरी जाणवत होते…

तरीसुद्धा यांचा उत्साह बघुन म्हटलं..

“वाह क्या बात है…असेच मजेत आनंदात  रहा…. परत येईन भेटायला……..”

© सुश्री नीता कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ फलटणमधील ‘सीतामातेचा डोंगर’… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? इंद्रधनुष्य ?

☆ फलटणमधील ‘सीतामातेचा डोंगर’… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

– श्री क्षेत्र सोमनथळी 

फलटणमधील ‘सीतामातेचा डोंगर’

चला आपल्या फलटणबद्दल थोडेसे जाणून घेऊयात

राम रावणाच्या युद्धानंतर जेव्हा राम अयोध्येला परत आले तेव्हा लोकांनी सीतेबद्दल शंका घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे नाईलाजाने रामाला सीतेचा त्याग करावा लागला. त्याने लक्ष्मणाला आज्ञा केली की सीतेला दूर कुठेतरी नेउन सोड. लक्ष्मण सीतेला घेऊन अयोध्येपासून खूप दूर आला. त्याने सीतेला एका ठिकाणी सोडलं आणि तो अयोध्येला निघून गेला…

लक्ष्मणाने सीतेला ज्या ठिकाणी सोडलं होतं ते ठिकाण आपल्या फलटणच्या शेजारी आजही ‘ सीतामातेचा डोंगर ‘ या नावाने प्रसिद्ध आहे. आजही हजारो स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी या ठिकाणी सीतामातेला वाणवसा घ्यायला जातात…

याच आपल्या पावन भूमीत लव-कुश यांचा जन्म झाला. रामाने ज्यावेळी अश्वमेध यज्ञ केला त्यावेळी या यज्ञाप्रसंगी जो घोडा सोडलेला होता तो लव-कुशने पकडला… त्यानंतर लव-कुश यांच्याबरोबर लक्ष्मण, शत्रुघ्न, भारत, सुग्रीव यांनी युद्ध केलं.. मारुतीही या युद्धाच्यावेळी उपस्थित होते. मात्र त्यांना समजलं की ही दोन्ही मुले रामाचीच आहेत. त्यामुळे त्यांनी युद्धात सहभाग घेतला नाही. लव-कुशने हनुमंताला एका अस्त्राने एका लिंबाच्या झाडाला बांधून टाकलं …

हे युद्ध ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणाचा उल्लेख रामायणमध्ये ” फलपठठनपूर ” असा केलेला आहे. ज्याचा अपभ्रंश होऊन आज ते ठिकाण फलटण या नावाने ओळखल जातं … 

रामायणामध्ये असा उल्लेख आहे कि लव-कुशने हनुमंताला ‘सम्स्थलि’ बांधलेले…

‘सम्स्थळ’ म्हणजे समान जागा, जिथे चढ-उतार जास्त नाहीत अशी…

त्या ‘समस्थळचा’ अपभ्रंश होऊन आज ते ठिकाण ‘सोमन्थलि’ या नावाने प्रसिद्ध आहे.

खूप वर्षांपूर्वी या ठिकाणी एका स्त्रीला एका लिंबाच्या झाडाखाली पडलेल्या गाईच्या गोवरीमध्ये हनुमानाचे दर्शन झाले… ती बेशुद्ध होऊन पडली… काही लोक तिला पाहायला गेले तर त्यांनाही हनुमंताचे दर्शन मिळाले. ही वार्ता गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली… त्या काळच्या एका प्रसिद्ध ब्राह्मणाकडून याबद्दलची माहिती काढण्यात आली. त्यावेळी हे तेच ठिकाण निघालं जेथे हनुमानाला बांधलेलं होत…मग लोकांनी भक्तिभावाने या ठिकाणी हनुमानाचे मंदिर बांधले. या मंदिराच्या पाठीमागे एक लिंबाचे झाड आहे. असे म्हणतात की हे लिंबाचे झाड मोठे होऊन जेव्हा मरून जातं तेव्हा त्याच ठिकाणी नवीन झाड उगवते. मारुतीचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालताना पाठीमागच्या या झाडाला मिठी मारून दर्शन घेण्याची पद्धत आहे. नवसाला पावणारा हा मारुती दक्षिणमुखी आहे….चैत्र शुद्ध पौर्णिमेला सोमंथळी मध्ये मोठी यात्रा भरते… मित्रानो समर्थ रामदासांनी ११ मारुतींची स्थापना केली हे सर्वाना माहित आहे… मात्र हा मारुती स्वयंभू आहे. याची स्थापना केली गेली नाही… सोमंथळी मध्ये तो स्वतः: प्रगट झाला आहे…

” श्री स्वयंभू दक्षिणमुखी मारुती मंदिर, श्री क्षेत्र सोमंथळी ” या नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे. गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू याचबरोबर इतरही अनेक राज्यातून लोक येथे दर्शनाला येतात…

मात्र याच मातीतल्या बऱ्याच लोकांना या ठिकाणाची माहिती नाही… कारण आपण रामायणाची पारायणे करतो .. मात्र मनापासून कधी वाचत नाही.

एव्हढा पौराणिक आणि सांस्कृतिक वारसा असणाऱ्या ठिकाणी आपण वावरतोय याचा थोडा तरी अभिमान असू द्या…

|| जय श्री राम ||

|| जय हनुमान ||

माहिती प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मराठी भाषादिनाच्या शुभेच्छा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ मराठी भाषादिनाच्या शुभेच्छा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

स्वतःची सहीसुद्धा मराठीत नसणाऱ्या, पण मराठीची उगीच तळमळ बाळगणाऱ्या तमाम मराठी बांधवांस थोर थोर शुभेच्छा..

A B C D सहज म्हणू शकणाऱ्या, पण मराठी शाळेत शिकूनसुद्धा अजूनही क ख ग घ पूर्ण म्हणता न येणाऱ्या मायमराठीच्या अडाणी लेकरांना कोपरापासून शुभेच्छा..

मॉलमध्ये गेल्यावर ‘ये कितने का है ?’ किंवा ‘हाऊ मच इट कॉस्टस ?’ असं विचारणा-या तमाम मराठी माणसांना मराठी भाषा दिनाच्या बळेच शुभेच्छा ..

आपली मुले इंग्रजी शाळांत घालून इतरांच्या मुलांना मराठीतून शिकण्याचा आग्रह धरण-या गुणीजनांनाही कोरडया शुभेच्छा..

व्हाट्सऍप वर लिहिताना केवळ ‘कंटाळा येतो म्हणून’ विचित्र मिंग्लिश भाषा वापरणाऱ्या नेटकऱ्यांना धन्य धन्य शुभेच्छा..

फेसबुकवर वाढदिवसाच्या दिवशी एचबीडी लिहिणाऱ्या किंवा टीसी (‘काळजी घे’ चे सूक्ष्म रूप), जीएन, जीएम, जीई, जीए, हाय, हॅलो, बडी, ब्रो, ड्यूड, सिस, हे मॅन, अंकल, आंट, पापा, ममी, मॉम्झ, डॅड असलं अरबट चरबट लिहिणा-या लोकांनाही ओढून ताणून शुभेच्छा…

टॅक्सी, रिक्षा, बस, रेल्वे, विमान, जहाज यातून प्रवास करताना किंवा अगदी पायी चालतानाही आपण मराठीत बोललो तर आपल्या अंगावर झुरळ पालींचा वर्षाव होईल असं समजणा-या भोळ्या भाबड्या मराठीप्रेमींनी काय घोडे मारलेय?.. त्यांनाही आज शुभेच्छा..

सरकारी कार्यालयात, कार्यप्रणालीत, कचे-यांत, बँकेत किंवा इतर स्थळी गेल्यावर समोरील माणूस ज्या भाषेत बोलतो त्याच भाषेत बोलताना, ‘मराठीचा किमान एका संधीसाठीही’ वापर न करणा-या मराठी माणसासही आभाळभर शुभेच्छा…

वर्षभरात एकही मराठी पुस्तक विकत न घेणा-या, कधीही मराठी नाटक – चित्रपट न पाहणा-या, जाणीवपूर्वक मराठी वाहिन्या न पाहता इतर वाहिन्या पाहणा-या, कधीही मराठी गाणं न गुणगुणणा-या, मराठी नियतकालिकाशी संबंध नसणाऱ्या, तमाम मराठी माणसांना मराठी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..

मराठी मुळाक्षरे, बाराखडी, व्याकरण, गद्य, पद्य याबाबत मनात कमालीची रुक्षता असणा-या, पण इंग्रजी स्पेलिंग तोंडपाठ करणाऱ्या बाळबोध जनतेस मराठी दिनाच्या शुष्क शुभेच्छा..

फक्त मराठी दिनापुरते मराठीचे तुणतुणे वाजवणा-या मराठी माणसास मराठी भाषा दिनाच्या जरतारी शुभेच्छा…

मराठी दिनाचे ढोंग न करता आयुष्यभर मराठीवर प्रेम करणा-या खऱ्याखुऱ्या मराठी माणसास मात्र मराठी दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा… 

जीवावर येऊन मराठीत वाचत, बोलत, लिहित नसाल, तरच हा संदेश पुढे पाठवा अन्यथा वाचून सोडून द्या ;पण केवळ औपचारिकता म्हणून किंवा लेखन आवडले म्हणून किंवा आपणही मराठीवर प्रेम करतो हे दाखवून देण्यासाठी, हा शुभेच्छा संदेश पुढे पाठवू नका.

कवी – अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रेम… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ प्रेम…  ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

नुकताच म्हणजे १४ फेब्रुवारीला प्रेम दिवस सगळ्या जगभर साजरा झाला. कोणाची संस्कृती असो किंवा नसो पण त्या दिवसाची संकल्पना आवडली असावी म्हणून प्रत्येक देशात हा दिवस साजरा केला नव्हे साजरा केला जातो.

पण प्रेम ही संकल्पना एवढी संकुचित आहे का हो? फक्त प्रियकर प्रेयसी या मधे असलेले नाते किंवा भावना म्हणजे प्रेम? मग आई, वडील -मुले, आजी, आजोबा -नातवंडे, पाळीव प्राणी – घरातील सदस्य, बहीण – भाऊ, मित्र – मित्र /मैत्रीण, किंवा इतर काही कारणाने निर्माण झालेले नातेसंबंध, उदा. मालक -कामगार, ज्येष्ठ -कनिष्ठ, स्त्री -पुरुष ई….

या सगळ्यांमध्ये असणारी भावना त्याने निर्माण झालेले नाते म्हणजे काय? हे प्रेम नाही?

मग कोणी म्हणेल आई, वडील – मुले म्हणजे मातृत्व /पितृत्व किंवा ममत्व/वात्सल्य

आजी, आजोबा – नातवंड म्हणजे जिव्हाळा,

पाळीव प्राणी – घरातील सदस्य म्हणजे लळा

बहीण – भाऊ म्हणजे बंधुत्व,

मित्र – मित्र /मैत्रीण, म्हणजे मैत्री

मालक – कामगार म्हणजे जबाबदारी

ज्येष्ठ -कनिष्ठ म्हणजे कुठे तरी समानत्व मान्य करून फक्त आधी -नंतर केलेला भेद

इतर कोणीही ओळखीचे अनोळखीचे आपल्याला भेटल्यावर त्यांच्याशी केलेला व्यवहार म्हणजे आपुलकी

स्त्री – पुरुष यामधे असलेल्या भावना म्हणजे केवळ शारीरिक आकर्षण? व्याभिचार?

जरा नीट विचार केला तर समजेल की मातृत्व /पितृत्व किंवा ममत्व/वात्सल्य,जिव्हाळा,लळा,बंधुत्व,मैत्री ,जबाबदारी,आपुलकी, दया, उपकार काळजी धाक या सगळ्या नावांच्या इमारती या प्रेमाच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत नावे वेगळी असली तरी हेच प्रेम आहे.

मग या सगळ्यासाठी एक दिवस? नाही नाही या सगळ्या साठी वेगवेगळे दिवस आहेत की असे पटकन सगळे म्हणतील. पण तरी सगळे दिवस जरी साजरे केले तरी फक्त एक एक दिवसच?

दुसरे असे की सगळे म्हणतात ईश्वर एक आहे पण मानवाने त्याच्या सोयीनुसार स्वरूप बदलून अनेक देवांची निर्मिती केली. गम्मत आहे ना ज्या देवाने निर्माण केले त्याच देवांना वेगवेगळे रूप देऊन त्याचे क्रेडिट आपण घेतो. असो तो विषय मोठा आहे.

पण हे जसे घडले ना अगदी तसेच प्रेम ही एकच भावना असताना त्याला वेगवेगळी नावे देऊन त्याला वेगवेगळ्या दिवसात विभागले जात आहे. स्त्री – पुरुष हे विवाहा नंतर दुसऱ्या बरोबर दिसलें तर ते लफडे, व्याभिचर… का ते प्रेम नाही होऊ शकत?

वेगवेगळे दिवस वेगवेगळ्या नावाने केले तरी फक्त त्या एका दिवसापुरतेच त्याचे महत्व? बाकी ३६४ दिवसांचे काय? तेव्हा पण या भावना जागृत असल्याच पाहिजेत ना?

प्रेम हे  त्रैलोक्यातील त्रिकालाबाधित सत्य आहे. ते सर्वत्र सारखेच आहे त्याला वेगवेगळे नाव देऊन विभागून त्याचा अपमान करू नका. प्रेमाला प्रेमच राहू द्या वेगळे नाव नको. आणि सगळ्याच संतांनी सांगितल्या प्रमाणे फक्त आणि फक्त प्रेमकी गंगा बहाते रहो……

एवढेच प्रेमाच्या माणसांना प्रेमाचे सांगणे

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares